बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. या भेटीत काँग्रेसने बारामतीतून उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी संवाद झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करून निवडणूक लढवण्याचा निर्धार आधीच स्पष्ट केला आहे. या चर्चेदरम्यान रोहित पवार यांनी पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीबाबत दिलगिरी व्यक्त केल्याचेही सांगितले. पार्थ पवारांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये काही प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. तसेच, अजितदादांना न्याय द्या, असा संदेश काँग्रेसकडून देण्यात आल्याचेही समजते. या भेटीत रोहित पवार यांचा काँग्रेसचे प्रभारी नेते चेन्नीथला यांच्यासोबतही संवाद झाला, ज्यामुळे या चर्चेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस जवळ आला असून, काँग्रेसने माघार न घेण्याची ठाम भूमिका घेतल्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज बारामतीत सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. सुरुवातीला वैध ठरलेल्या 53 अर्जांपैकी आता 47 उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. मात्र अंतिम आकडेवारी सायंकाळनंतर स्पष्ट होणार असून, शेवटच्या दिवशी आणखी घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्या विरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना मैदानात उतरवले आहे. काँग्रेसने आतापासूनच प्रचाराची तयारी सुरू केली असून, बारामतीत थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुरी पोटनिवडणुकीतही माघारीच्या प्रक्रियेला वेग दुसरीकडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतही माघारीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दुसऱ्या दिवशी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता 18 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या मतदारसंघात भाजप-महायुतीचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंदराव मोकाटे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता दिसत आहे. राहुरीत शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले असून, तसेच ठाकरे गटाचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांच्या उमेदवारीबाबतही उत्सुकता आहे. अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांत मोठे राजकीय निर्णय आणि अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता या शेवटच्या टप्प्याकडे लागले आहे.
कुर्डुवाडी ९ वर्षांच्या प्रशासकीय कालानंतर २०२५ मध्ये झालेल्या कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाने नगराध्यक्षपद मिळवले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत (१३ नगरसेवक) आहे. शिवसेना शिंदे गटाकडे एक सदस्य असून एक अपक्षही शिवसेना(उबाठा) गटाशी जोडला गेला. नगरपालिकेत विरोधी गटच नसल्याने सत्ताधारी गटांतच मानापमान नाट्य आणि खेकडी चाल सुरू झाली असून, यामुळे शहरातील मूलभूत प्रश्न व विकासकामे रखडली आहेत असा आरोप नागरिक करत आहेत. निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाकडे नगराध्यक्षसह सहा सदस्य (पाच सदस्य + एक अपक्ष), राष्ट्रवादीकडे १३ नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाकडे एक सदस्य निवडून आले. राष्ट्रवादीकडे बहुमत असले तरी नगराध्यक्षपद शिवसेना गटाकडे गेल्याने दोन्ही पक्ष सत्ताधारी झाले. यामुळे सभागृहात विरोधकांचा अभाव असून, सत्ताधारी गटांतच एकमेकांना आव्हान देण्याची खेकडी चाल सुरू आहे. जनतेने दिलेल्या कौलानुसार दोन्ही पक्ष एकमेकांविना पुढे जाऊ शकत नाहीत, पण मानापमानाच्या निमित्ताने विषय हाणून पाडण्याचा प्रकार वाढला आहे . नागरिकांच्या हितांना धक्का आणि भीती थकीत मालमत्ता कर शास्ती माफीला सभागृहात मंजुरी मिळाली, कारण हा नागरिकहिताचा जिव्हाळ्याचा मुद्दा होता. मात्र राष्ट्रवादी आरोग्य सभापती मोहसीन मकणू यांच्या अखत्यारीतील न्यायालयीन आदेशित भटक्या श्वानांच्या नसबंदीचा विषय नामंजूर झाला. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोधाला विरोध म्हणून हा विषय पुढील सभेसाठी ढकलला. तसेच राष्ट्रवादी शिक्षण सभापती संजय टोणपे यांनी आरोग्य विभागाची जेटींग मशीन बाहेर पैसे कमावत असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीचेच सर्व सभापती असतानाही हे आरोप होत असल्याने सत्ताधारी गटातील अंतर्गत कलह उघडकीस आला आहे. रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसारखे प्रकल्प रखडले असून शहराच्या धुळ मुक्तीचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. दुसऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वी राष्ट्रवादीचे सदस्य नगराध्यक्षांविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असल्याचा आरोप शिवसेना गटातील स्वीकृत नगरसेवक धनंजय डिकोळे यांनी केला. नगराध्यक्षांनी न्यायालयीन आदेशाप्रमाणे भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफी हे दोनच विषय मांडले. राष्ट्रवादीने या विषयांपूर्वी आयत्यावेळीचा विषय म्हणून भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातील एका रस्त्याला भगवान महावीर पथ नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. डिकोळे यांनी सदर समाजाने कोणालाही विश्वासात न घेता व गांधी यांच्या सांगण्यावरुन मिटींगलाही बोलावले नसल्याचा आरोप करून, आधी अध्यक्षांचे दोन विषय मंजूर करा, मग हा घेऊ अशी सूचना मांडली. यावरून सभागृहात जोरदार नाट्य घडले. या खेकडी चालीमुळे नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रभागातील मूलभूत कामे करता येत नाहीत. भटक्या कुत्र्यामुळे आरोग्य- सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर झाले असून, रस्त्यांची अर्धवट कामे, पाण्याची कमतरता, कचरा संकलन व फवारणी यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. हे मानापमान नाट्य असेच चालू राहिले तर कुर्डुवाडी शहराला मोठे नुकसान होईल, अशी भीती आहे.
शासन व जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध कृषी उपयोगी यंत्रे व औजारांच्या अनुदानित योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती सुधारण्यासाठी आवश्यक असलेली विविध यंत्रसामग्री अनुदानावर किंवा कमी दरात दिली जातात.मात्र, बदलत्या काळानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित किटचा समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सोलापूर जिल्ह्यात केळी, डाळिंब, ऊस व इतर नगदी पिकांच्या क्षेत्रात मागील काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. विशेषतः केळी आणि डाळिंब, द्राक्ष उत्पादकांनी मोठी आघाडी घेतली आहे. आगामी काळात जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तसेच उत्पन्नात दुपटीने वाढ करण्यासाठी होईल तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अनुदान मिळत नसल्याने शेतक-यांना किटसाठी सुमारे २५ हजार खर्च करावा लागतो. त्यामुळे अनुदानित योजनांमधून एआय किट द्यावे, अशी मागणी होत आहे. लक्ष्य फवारणी: जिथे गरज आहे तिथेच औषध फवारणी करून खर्चात बचत. प्रिसिजन फार्मिंग: माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, ठिबकचा वापर. निर्यात दर्जा : बंच स्प्रे, स्कर्ट बॅग, बड इंजेक्टर या साधनांमुळे केळीचा दर्जा. ^सोलापूर जिल्ह्यात एकूण सुमारे ३२ हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली आहे. करमाळा तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडी खाली आहे. जिल्ह्यात डाळिंब व द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. उत्पादनात दुपटीने वाढ व्हावी, तसेच जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादनासाठी कृषी यंत्र औजार या अनुदानित योजनेत एआय किटचा समावेश करण्यात यावा. संतोष झांझुर्णे, प्रगतशील शेतकरी, रामवाडी . खते व पाणीवापर खर्चात मोठी बचत . कीड व रोग नियंत्रणामुळे उत्पादनात वाढ . केळीला जागतिक बाजारपेठेत चांगला दर . टिश्यू कल्चर, मल्चिंगमुळे दर्जा सुधारणा ^कृषी यंत्र औजार अनुदान योजनेत एआय किटचा समावेशाची मागणी होत आहे. कोणती यंत्रे, औजारांसाठी योजना राबवण्याचे धोरण शासनस्तरावर ठरते. वरिष्ठांकडे मागणीचा प्रस्ताव पाठवून योग्य कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. - राजेंद्र नेटके, तालुका कृषी अधिकारी , करमाळा. ^मागील २ वर्षापासून माझ्या शेतात एआय तंत्रज्ञान वापरुन शेती करत आहे. त्यामुळे मोठा बदल घडून आला असून उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून तब्बल एकरी ११० टन ऊसाचे उत्पादन घेतले आहे. धुळाभाऊ कोकरे, कुगाव, ता करमाळा. शेतकऱ्यांना होणारे फायदे योजनेत एआय किट करता पाठपुरावा करु हवामानाचा अंदाज घेऊन पिकांना आवश्यक तेवढेच पाणी नियोजन.
पंढरपूर कॉरिडॉर, उजनी पर्यटन विरोधात एल्गार:अधिकारी आणि पालक मंत्र्यांकडून उपोषणाची दखल नाही
उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, जल पर्यटन प्रकल्प व अतिरिक्त संपादित जमिनींच्या मोजणी विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाचा उद्या तिसरा दिवस असून शासनाने कसलाच प्रतिसाद न दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. माढा तालुका उजनी धरणग्रस्त शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. संघटनेचे अध्यक्ष सुरेश पांडुरंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रस्तावित केलेल्या जल पर्यटन योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उपजिविकेवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. जल पर्यटन योजनेला सर्व धरणग्रस्त शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) धोरणा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांवर २०१९ ते २०२५ दरम्यान काढण्यात आलेल्या शासन निर्णयांचा पुनर्विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रतिनिधी | पंढरपूर कॉरिडॉरच्या नावाने होणारा विध्वंसक विकास नाकारून शहराचा शाश्वत विकास करा. सामान्यांची घरे-दुकाने वाचवण्यासाठी सरकारी मोकळ्या जागांचा वापर व्हावा, या मागणीसाठी ‘पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती'च्या वतीने बुधवारी शहरातून मोटारसायकल रॅली काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. खादी ग्रामोद्योग भवनपासून सकाळी ९.३० वाजता सुरू झालेली ही रॅली शहरातील विविध भागांतून मार्गक्रमण करत प्रांत कार्यालयावर धडकली. खादी ग्रामोद्योग, स्टेशन रोड येथून निघालेली ही रॅली सावरकर पुतळा, जुने बसस्टँड, भोसले चौक, जुने कोर्ट, हनुमान मैदान, नगरपालिका दवाखाना, जळका वाडा, कालिकादेवी चौक, सीपीडब्ल्यूडी (मध्यप्रदेश) मार्गे सांगोला चौकात पोहोचली. तेथून भाजी मंडई, चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज सध्या प्रस्तावित असलेल्या कॉरिडॉर मुळे शहरातील पिढ्यानपिढ्यांचा आध्यात्मिक वारसा, घरे, दुकाने, मठ आणि मंदिरे उद्ध्वस्त होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. हे विस्थापन टाळण्यासाठी सरकारने स्वतःच्या ताब्यातील वर्षानुवर्षे बिगर उपयोगाच्या पडून असलेल्या जागांचा विकास करावा, या मुख्य उद्देशाने ही शोधयात्रा आयोजित करण्यात आली होती. रॅली दरम्यान अशा विविध सरकारी जागांची पाहणी करून त्यांचा विकासासाठी कसा वापर करता येईल, याचे विवेचन करण्यात आले. महाराज चौक, गजानन महाराज मंदिर पिछाडी, संत गाडगे महाराज चौक, यमाई तलाव खालचे पार्किंग, एमटीडीसीचे भक्तनिवास, ब्लड बँक आणि पद्मावती उद्यान पिछाडी अशा विस्तृत मार्गावरून ही फेरी काढण्यात आली. रॅलीचा समारोप प्रांत कार्यालयावर झाला. या ठिकाणी बचाव समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पंढरपूरचे पावित्र्य राखून आणि कोणत्याही नागरिकाचे नुकसान न करता सरकारी जागांवरच विकास व्हावा, अशी आग्रही मागणी केली. अति.संपादित जमीनींचा प्रश्न कोल्हापूर उच्च खंडपीठात धरण परिसरातील अतिरिक्त संपादित जमिनींचा प्रश्न कोल्हापूर उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना कोणतीही मोजणी अथवा पुढील कारवाई करू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. या जमिनींवर मूळ मालकांच्या वारसांनी शेती व इतर उपजविकेची साधने उभी केली आहेत. अनेक ठिकाणी घरे, मंदिरे व इतर बांधकामेही अस्तित्वात आहेत. त्यामुळे या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. शासकीय जागांचा विकास करा, आंदोलकांची मागणी
नाशिक जिल्ह्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणात अशोक खरात याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आधीच अनेक गंभीर गुन्ह्यांना सामोरे जात असताना आता त्याच्याविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सिन्नर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या नव्या प्रकरणामुळे खरातविरोधातील गुन्ह्यांची संख्या चौदा झाली असून तपास यंत्रणांनी कारवाई अधिक तीव्र केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील मिरगाव परिसरात जमीन व्यवहाराच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 2003 ते 2004 या कालावधीत त्यांनी शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करताना मंदिर उभारण्याचा बहाणा केला. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत त्यांनी शेतजमिनी आपल्या नावावर करून घेतल्याचे उघड झाले आहे. ईशान्येश्वर मंदिर, फार्महाऊस, आंब्याची बाग आणि इतर मालमत्ता या व्यवहारात समाविष्ट असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, शेतकऱ्यांनी विरोध केल्यास जादूटोणा करून नुकसान करण्याच्या धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 16.50 एकर जमीन केवळ 15 लाख रुपयांत विकत घेतल्याची नोंद असून या व्यवहाराची चौकशी आता सखोलपणे केली जाणार आहे. फसवणूक आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. दरम्यान, अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दुसऱ्या गुन्ह्यातील पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याचवेळी तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेण्यासाठी विशेष तपास पथकाने अर्ज केला असून तो मंजूर करण्यात आला आहे. या तिसऱ्या गुन्ह्यात महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप असून, एका गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हाही दाखल आहे. फसवणूक करण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या या प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे खरातचे नवे कारनामे उघड होत आहेत. भाविकांची फसवणूक करण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या जात असल्याचे समोर आले आहे. स्वस्त वस्तू महागात विकणे, बनावट साधनांचा वापर करून भीती निर्माण करणे अशा प्रकारांमुळे अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता न्यायालयात पुढील सुनावणीत काय घडते आणि तपास यंत्रणा कोणती भूमिका मांडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना पक्ष जाती धर्माच्या पलीकडे जाऊन न्याय देतात. दिलेला शब्द पाळण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ज्यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतात, त्यांना कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही. मी एक रुपयेही खर्च न करता मला खासदार केले. गोरगरिबांच्या घरातील व्यक्तीला मोठे केले. कुठलाही प्रकाराचे अन्याय, त्रास होऊ देणार नाही. तसे झाल्यास मी स्वतः तुमच्या सोबत संघर्षासाठी असणार आहे. अक्कलकोटमध्ये पाटील, तानवडे, म्हेत्रे हे तिन्ही मातब्बर परिवार एकत्र आहेत हे महत्त्वाचे आहे. त्रिशूल तयार झाले आहे. सिद्धाराम म्हेत्रे आमदार, नामदार नसूनही दमदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे कमी असूनही जिंकले आहेत, असे प्रतिपादन नूतन खासदार डॉ.ज्योती वाघमारे यांनी केले. नागरी सत्कार सोहळा व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा शिवसेना अक्कलकोट शहर व ग्रामीणच्यावतीने येथील जुना आडत बाजार येथे बुधवारी सायंकाळी उत्साहात पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे हे होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश साठे, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे,जिल्हाप्रमुख अमर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, शिवानंद पाटील, सागर पाटील, धानेश अचलेरे, जिल्हा परिषद सदस्य शिवराज म्हेत्रे, प्रवीण तानवडे, पंचायत समिती सदस्या शीतल म्हेत्रे, दुधनीचे उपनगराध्यक्ष जिलानी नाकेदार, महिला जिल्हाप्रमुख रवीना राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक आनंद तानवडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश सुरवसे यांनी केले. विश्वा जवळगे यांनी आभार मानले. यावेळी व्यंकट मोरे, ॲड. फारिया टिनवाला यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील शिवसेनेचे आजी- माजी पदाधिकारी नेते, कार्यकर्ते, मतदार बंधूभगिनी, म्हेत्रेप्रेमी व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित होते. तालुक्यात द्वेषचे राजकारण सुरू झाले आहे. तानवडे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी भाजपा रुजवली पण यांना भाजपने डावलले. सर्वांचे योगदान आहे. हुकूमशाही, एकाधिकारशाही सुरू आहे. जिद्दीने काम करावे लागणार आहे. गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक ही योजना राबवावे लागणार आहे. मतदार याद्यांचे पुनर्लेखन सुरू आहे. त्यावर लक्ष ठेवावे लागणार आहे. एक महिना चांगले लक्ष द्यावे लागणार आहे. मतदार यादी साठी दक्ष राहा. काम केले तर पदे मिळतील असे सांगितले. सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री
शहरात महापालिकेची सुमारे ३३ उद्याने आहेत. त्यापैकी तीन उद्याने खासगी संस्थेकडे देण्यात आली आहेत. मात्र, उर्वरित ३० पैकी ठराविक १० ते १५ उद्याने वगळता उर्वरीत उद्याने भकास अवस्थेत आहेत. या उद्यानात नागरिकांना विरंगुळ्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी सुविधाच नाहीत. मनपाने मागील वर्षभरात या उद्यानांच्या देखभालीसाठी अवघे ९८ हजार रुपये खर्च केले आहेत. तर दुसरीकडे उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर वर्षभरात ४.९० कोटींचा खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. दिवसेंदिवस वाढत्या नागरीकरणामुळे नागरिकांकडून क्रीडांगणे, उद्याने उभारण्याची, उद्याने विकसित करण्याची मागणी होत आहे. मात्र, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्षांपासून उद्यानांच्या दुरवस्थेचा विषय गंभीर झाला आहे. शहरात महापालिकेची ३३ उद्याने असल्याची नोंद कागदावर आहे. त्यातील गंगा उद्यान, सिद्धीबाग व महालक्ष्मी उद्यान खासगी संस्थेला चालविण्यास देण्यात आले आहेत. उर्वरित उद्यानांपैकी काही ठराविक उद्याने स्थानिक नगरसेवक व काही संस्था, कंपन्यांच्या पुढाकारातून विकसित झाली. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक उद्यानांची भकास अवस्था झाली आहे. महापालिका सतत आर्थिक अडचणीचे कारण पुढे करते. उद्यानांची देखभाल व तेथील खेळण्यांची दुरुस्तीही महापालिका करत नाही. गेल्या वर्षात उद्यानांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी फक्त ९८ हजार खर्च झालेत. सावेडी उपनगरात लाखो रुपये खर्चून विकसित केलेल्या नंदनवन कॉलनी येथील उद्यानाची देखभालीअभावी झालेली दुरावस्था. वसुंधरा अभियानांतर्गत लाखोंचा खर्च राज्य शासनाच्या वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवड, ऑक्सिजन पार्क विकसित करणे यासारखे उपक्रम हाती घेतले जात आहेत. मात्र, केवळ सर्वेक्षणासाठीच हे उपक्रम राबविले जातात. सर्वेक्षण झाल्यावर याची देखभाल न झाल्याने त्यावर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे. महापालिकेने सध्या सुस्थितीत असलेल्या उद्यानांची देखभाल करण्यासाठी ठोस धोरण निश्चित करण्याची गरज आहे. वृक्ष लागवडीचा पाच कोटींचा खर्च वाया केंद्र शासनाच्या हरित क्षेत्र विकास योजनेअंतर्गत गेल्या काही वर्षांत महापालिकेने ५ कोटी रुपये वृक्ष लागवडीवर खर्च केला आहे. यातून २३ उद्याने व सीना नदी काठावर मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली होती. मात्र, देखभाल न झाल्याने हा खर्च वाया गेल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत अनेक नगरसेवक उद्यान विकसित करण्याऐवजी लाखो रुपये खर्चून केवळ सुशोभीकरण करण्यावर उधळपट्टी करत आहेत.
प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार आता अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देवस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी आता मंत्रालयीन ‘कक्ष अधिकारी’ दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज मागविण्यात आले असून ३० एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. २०१८ च्या विशेष कायद्यानंतर शनिशिंगणापूर देवस्थान सरकारी अखत्यारीत आले असले, तरी अद्याप नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती झालेली नाही. सध्या नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम हेच सध्या प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त होईपर्यंत, या नवीन नियुक्तीमुळे देवस्थानचा कारभार अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार पारदर्शक व सुरळीत करण्याची मागणी केली होती. नवीन कायद्यानुसार सरकारकडून लवकरच नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत तोपर्यंत कार्यकारी अधिकारीपद भरण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. कारभारात शिस्त आणि अचूकता येईल मंत्रालयीन कक्ष अधिकारी दर्जाचे अधिकारी नियुक्त केल्यामुळे देवस्थानच्या प्रशासकीय कामकाजात शिस्त आणि अचूकता येईल. मंत्रालयातील कामाचा अनुभव असल्याने त्यांना कायदेशीर बाबी, सरकारी नियम आणि धोरणात्मक निर्णयांची सखोल समज असते. यामुळे देवस्थानच्या विकासकामांना वेग येईल, आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता राहिल आणि सरकारी नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे शक्य होईल. नेमका काय होईल बदल { पात्रता: शासकीय सेवेतील कक्षाधिकारी' पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक. { बदल: यापुढे आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांऐवजी शासननियुक्त अधिकारी कार्यभार पाहणार. { भूमिका: देवस्थान, विश्वस्त मंडळ आणि सरकार यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कामकाज. { फायदा: देवस्थानच्या कारभारावर आता सरकारचे थेट नियंत्रण आणि प्रशासकीय पारदर्शकता येणार.
असफल झालेल्या विद्यार्थ्यांना सफल कसे व्हावे याची प्रेरणा भागवत कथेमधून मिळते. विद्या धन प्राप्त करण्यापूर्वी परमात्म्याचे स्मरण आवश्यक असते. दिवसाची सुरुवात भगवंताचे स्मरण करून करावी. आपल्या भारतीय संस्कृतीत भगवंताच्या स्मरणास अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेळ निश्चित करून दररोज भगवंताचे भजन करावे, जीवनातील अडीअडचणी कमी होत चालल्याचे अनुभवास येते. जीवनात यशस्वी होण्याचे आणि आनंद मिळवण्याचे गूज भागवत कथा सांगते, असे प्रतिपादन राधाकृष्णजी महाराज यांनी केले. येथील रामनिवास इंदाणी आणि इंदाणी परिवारातर्फे नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे तृतीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. व्यासपीठावर हभप भास्करगिरी महाराज होते. महेश इंदानी यांच्या हस्ते भास्करगिरी महाराजांचा तर दिव्या इंदाणी यांच्या हस्ते महापौर ज्योती गाडे यांचा सन्मान करण्यात आला. राधाकृष्ण महाराज म्हणाले, राजा परीक्षित आपल्या प्रपंचाचा आणि राज्य कारभाराचा भार भगवंताकडे सोपवून निरंतर कथा श्रवणाचा आनंद घेत होते. त्यामुळे ते श्रवण भक्तीचे आचार्य आणि आदर्श झाले. राजा असून राज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांना कधीही युद्ध करावे लागले नाही. अंत:करण निर्मळ असले की भगवंताचा प्रभाव दिसून येतो. चित्तात भजन उतरले की, चिंतामुक्त होण्याचा आनंद मिळतो. सीमेवरील सैनिक भययुक्त नसतो तर भयमुक्त असतो. आपल्या देशातील सैनिक महात्मा पेक्षा कमी नाही, असे त्यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट होत भारत मातेचा उत्स्फूर्त जयघोष उपस्थित भाविकांनी केला.भजनाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, भक्त मागील दहा पिढ्यांचा आणि पुढील दहा पिढ्यांचा उद्धार करतो हे सत्य आहे. त्यामुळेच आजही संतांची नावे घेतली की, मन प्रसन्न होते. भक्तांशी संबंध जोडला की, मन शाश्वत आनंदाची अनुभूती घेत रहाते. लहानांप्रती स्नेह आणि मोठ्यांबद्दल आदर ठेवावा, जीवन आनंददायी होते. व्यापाऱ्यांना इमानदारीने व्यापार करतानाही अडचणींचा सामना करावा लागतो. हभप भास्करगिरी महाराजांनी भागवत कथा जीवनातील भिती घालवणारी आहे असे सांगितले. कथा श्रवण करण्यासाठी शहराच्या विविध उपनगरातील भाविकांची अलोट गर्दी होऊ लागली आहे. दररोज गर्दीचा उच्चांक होऊ लागल्याचे दिसून येते आहे.
गहू पिकासाठी शासनाच्या हमी भावाने खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासे बाजार समितीच्यावतीने तहसील डॉ. संजय बिरादार यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यात १८,७८६ हेक्टरवर गव्हाचे क्षेत्र असून यावर्षी हवामान अनुकुल असल्यामुळे गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी गहु पिकावर अवलंबून आहेत. परंतु मागील महिन्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात गहु पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे बाजारात गव्हाचे दर शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत. शासनाने गहू या पिकासाठी २५८५ रुपये प्रती क्विंटल इतका हमीभाव जाहीर केलेला असताना काही व्यापारी मालाची प्रत खूप कमी आहे असे कारणे देऊन गहू अवघ्या १८०० ते २२०० रुपये भावाने खरेदी करत असल्याच्या तक्रारी बाजार समितीकडे प्राप्त होत आहेत. सध्या तालुक्यात शासनाने गहु खरेदी करण्यासाठी अधिकृत हमीभाव खरेदी केंद्र उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दराने गहू विकावा लागत आहे. तसेच वाहतूक खर्च, मजुरी खर्च आणि इतर शेतीसंबंधित खर्च वाढलेले असल्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे. शासनाने नेवासा तालुक्यात तात्काळ गहू खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू करावे तसेच खरेदी प्रक्रिया सुलभ व पारदर्शक पद्धतीने राबवावी जेणे करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. या बरोबरच खरेदी केंद्रावर पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली. यावेळी नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, संचालक गणेश ढोकणे, नारायण लोखंडे, अरुण शिंदे, राजेंद्र सानप, अण्णासाहेब पटारे आदी उपस्थित होते.
केवळ शास्त्रज्ञान, उच्च शिक्षण किंवा मोठे पद मिळवणे यावरून मनुष्य शहाणा ठरत नाही. जो स्वतःच्या खऱ्या हिताचा आणि आत्मकल्याणाचा विचार करतो, तोच खऱ्या अर्थाने शहाणा असतो, असे प्रतिपादन रामभाऊ महाराज राऊत यांनी केले. नेवासा तालुक्यातील निंभारी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सहाव्या दिवशी रामभाऊ महाराज राऊत यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराजांनी “देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज” हा अभंग घेऊन अत्यंत परखड व हृदयस्पर्शी अध्यात्मिक विवेचन केले. देहाभिमान विसरून आत्मज्ञानाकडे वळणे हाच खरा स्वहिताचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनुष्य देहाच्या मोहात अडकतो; मात्र देहाचा विसर पडल्यावरच खरा आत्मिक आनंद आणि समाधान प्राप्त होते, असे त्यांनी विविध उदाहरणांतून पटवून दिले. संत महात्मेच आपल्याला खऱ्या हिताचा मार्ग दाखवतात. त्यामुळे नामस्मरण, भजन आणि संतसंग यांना जीवनात महत्त्वाचे स्थान द्यावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित भाविकांना केले. दरम्यान, रामभाऊ महाराज राऊत यांची कीर्तन सेवा सात व आठ तारखेलाही होणार असून भाविकांना त्यांच्या ओजस्वी वाणीतील सखोल अध्यात्मिक विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. अखंड हरिनाम सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभत आहे. याप्रसंगी हभप देविदास महाराज म्हस्के, हभप भगवान महाराज जंगले, हभप नंदकिशोर महाराज खरात, हभप रामनाथ महाराज पवार, हभप आदिनाथ महाराज भोगे, हभप गणेश महाराज आरगडे, हभप श्रीहरी महाराज वाकचौरे, हभप सागर महाराज टेमक, हभप ऋषिकेश महाराज वाल्हेकर यांच्यासह अनेक महाराज मंडळी उपस्थित होती. पंचक्रोशीतील भजनी मंडळ, तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व विठ्ठल-रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र, गोणेगाव चौफुला येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अखंड हरिनाम सप्ताहामुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. कीर्तनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे परिसरात नवचैतन्य निर्माण झाले आहे. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप होत आहे. त्यामुळे या सोहळ्याप्रसंगी मोठ्या प्रमाणात अन्नदान होत आहे.
व्यस्त जीवनशैलीतून मानसिक ताजेपणा मिळविण्यासाठी आणि अडचणींना सामोरे जाण्याची ताकद निर्माण करण्यासाठी खेळासारखा उत्तम पर्याय दुसरा नाही. खेळातून सांघिक भावना वाढीस लागून एकोपा निर्माण होतो. म्हणून सकारात्मक जीवनशैली घडविणासाठी खेळाचे जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे, असे उद्गार संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी काढले. कोपरगाव गुरुजी प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा संकुल, टाकळी फाटा येथे पार पडले. या सोहळ्यात कोल्हे बोलत होते. माजी सभापती सुनील देवकर उपस्थित होते. कोल्हे पुढे म्हणाले, शिक्षकांसारख्या समाजघटकांसाठी अशा स्पर्धा केवळ मनोरंजनापुरत्या मर्यादित नसून त्या आरोग्यदायी व सकारात्मक जीवनशैली घडविणाऱ्या ठरतात. यावेळी त्यांनी संजीवनी परिवाराची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करत अशा उपक्रमांना संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांचे नेहमी पाठबळ असते. स्पर्धेदरम्यान लागणाऱ्या वैद्यकीय सुविधांसाठी संजीवनी आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल तसेच संपूर्ण संजीवनी शिक्षण संस्था सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी त्यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा दिला. या मैदानावर स्वतः स्व. कोल्हे उपस्थित राहून त्यांनी केलेल्या वृक्षारोपण व संगोपनाची आठवण सांगताना आज या झाडांची सावली म्हणजे जणू त्यांचे आशीर्वादच असल्याची भावनिक भावना त्यांनी व्यक्त केली.या सामन्यांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ विजेत्या संघाला अनुक्रमे ७१०१, ५१०१, ३१०१ व २१०१ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. मालिकावीरास ११०० चे बक्षिस आहे. तसेच सर्वाधिक चौकार, उत्कृष्ट गोलंदाज, उत्तम संघ, सर्वाधिक षटकार, उत्कृष्ट झेल, हॅटट्रीक, उत्कृष्ट यष्टीरक्षक, अष्टपैलू खेळाडू सामनावीर अशा वर्गवारीतील खेळाडूंना ट्रॉफी बक्षीस देण्यात येणार आहे.याप्रसंगी किरण निंबाळकर, मनोहर शिंदे, महेंद्र विधाते, रमेश दरेकर, शशिकांत जेजूरकर, माणिक कदम, मनोज सोनवणे, विद्या आढाव, सुनील पोरे, दिपक तुंगार, राहुल भागवत, विलास गवळी, चंद्रविलास गव्हाणे, अमोल कडू, मारुती भोईर, सुधाकर निकुंभ, संजय साबळे, नारायण कवडे, गोविंद आढळ आदींसह क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीसमोर उभ्या राहिलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा परिसरात एक वेगळीच आर्थिक चळवळ पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनहून दरवर्षीप्रमाणे यंदाही व्यापाऱ्यांनी विविध जातींच्या कोंबड्या व बदकांसह हजेरी लावली असून, या पंखांच्या बाजाराला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून पारंपरिक दुग्ध व्यवसायाबरोबरच आता कुक्कुटपालन आणि विशेषतः बदक पालनाकडे शेतकरी झुकताना दिसत आहेत. जुन्नर तालुक्यात चिनी कोंबडी, राजहंस डक आणि व्हाईट डक यांची मागणी वाढली असून अनेक शेतकरी या व्यवसायाकडे उत्पन्नाचे पर्यायी साधन म्हणून पाहत आहेत. या पक्ष्यांची एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जलद वाढ आणि तुलनेने चांगली रोगप्रतिकारक क्षमता. त्यामुळे कमी वेळात उत्पन्न देणारा हा व्यवसाय म्हणून त्यांना पसंती मिळत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता अशा नव्या संधींचा शोध घेत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दरांच्या बाबतीतही या बाजारात चांगली उलाढाल होत आहे. बदकाची जोडी सुमारे १३०० रुपये, व्हाईट डक ४००० रुपये, राजहंस ७००० रुपये, तर चिनी कोंबडीची जोडी सुमारे १२०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. विशेष म्हणजे या जाती पुणे जिल्ह्यात सहज उपलब्ध नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांसाठी हा थेट खरेदीचा मोठा पर्याय ठरत आहे. दरवर्षी उज्जैनहून येणाऱ्या या व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना दूरवर भटकंती न करता दर्जेदार पक्षी मिळत आहेत. त्यामुळे अनेकांनी आपल्या शेतात छोट्या प्रमाणात का होईना,पण पूरक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आळेफाटा परिसरात हा छोटा पण परिणामकारक व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
धुळगावची दिव्या बनली पोलिस:आठ महिन्यांपूर्वीच मातृछत्र हरपलेले असतानाही यशाला गवसणी
एकीकडे आठ महिन्यांपूर्वीच मातृछत्र हरपलेले असताना आणि दुसरीकडे नातेवाईकांकडून विवाहासाठी होणारा दबाव झुगारून, धुळगाव (ता. येवला) येथील दिव्या बारहाते हीने पोलीस दलात झेप घेत आपले आणि वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही दिव्याने जिद्दीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात नाशिक पोलिस दलात स्थान मिळवले आहे. दिव्याचे प्राथमिक शिक्षण धुळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण नारायणराव पवार माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर तिने येवला येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने नाशिक येथील संघर्ष करिअर अॅकेडमीमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, तयारी सुरू असतानाच गेल्या आठ महिन्यांपूर्वी तिच्या आजारी आईचे निधन झाले. या मोठ्या दुःखातून सावरत असतानाच नातेवाईकांकडून तिचे लग्न लावून देण्यासाठी वडिलांवर दबाव वाढू लागला. अशा परिस्थितीतही खचून न जाता दिव्याचे वडील तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. तिला तिचे काका सचिन बारहाते यांचेही मोलाचे मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाला.
आगारप्रमुख व दोन सहायक वाहतूक अधिकाऱ्यांनी अपमानित करून जातिवाचक बोलल्याने अपमान सहन न झाल्याने वाहतूक नियंत्रण शरद विठ्ठल भिवसने (४०, रा. वडोद चाथा, सिल्लोड, ह.मु लक्ष्मी कॉलनी, सिल्लोड) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी शहरातील आनंद पार्क परिसरात दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी मृताचे भाऊ पोपट विठ्ठल भिवसने यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले की, भाऊ शरद हे सिल्लोड आगारात सहायक वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत होते. मागील एक महिन्यापासून हृदयविकाराचा आजार असल्याने ते वैद्यकीय रजेवर होते. त्यांची बढती झाल्याने माझी सिल्लोडलाच नियुक्ती करावी म्हणून त्यांनी विनंती अर्ज सिल्लोड आगारप्रमुखांना दिला. दरम्यान, बुधवारी सकाळी नऊ वाजता ते हजर होण्यासाठी सिल्लोड आगारात गेले असता, तेथील आगारप्रमुख विजय काळवणे, सहायक वाहतूक अधिकारी किरण अवसरमल व विकास चव्हाण यांच्याकडे गेले असता तुम्ही हजर होण्यासाठी आले असताना असे मळालेले कपडे, पायात चप्पल का घातली नाही, दाढी का केली नाही व आपल्या हुद्द्याचा पोशाख का घातला नाही?' असे म्हणून त्यांनी जातीचा उल्लेख करून अपमानित केले. तो अपमान सहन न झाल्याने शरद भिवसने यांनी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भराडी रस्त्यावरील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
सिल्लोड तालुक्यातील भराडी परिसरालगत असलेल्या बोजगाव येथे सुमारे साठ वर्षांपासून खंडित झालेली लक्ष्मी मातेची पारंपरिक यात्रा यंदा गावातील तरुणांच्या पुढाकारातून आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सुरू करण्यात आली. या ऐतिहासिक पुनरुज्जीवनामुळे गावासह परिसरात आनंद, भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बोजगाव येथे पूर्वीपासून लक्ष्मी मातेची यात्रा मोठ्या भक्तिभावाने भरत होती. गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा हा महत्त्वाचा भाग होता. मात्र, काही कारणास्तव ही यात्रा सुमारे सहा दशकांपूर्वी बंद पडली होती. काळाच्या ओघात ही परंपरा लोप पावत चालली होती. दरम्यान, आसपासच्या गावांमध्ये दरवर्षी उत्साहात जत्रा भरत असल्याचे पाहून बोजगावातील तरुणांमध्ये आपल्या गावाची परंपरा पुन्हा जिवंत करण्याची भावना निर्माण झाली. आपल्या गावातही यात्रा का नसावी? या विचारातून त्यांनी पुढाकार घेतला. यासाठी गावातील ज्येष्ठ मंडळी, ग्रामस्थ आणि विविध घटकांशी चर्चा करून नियोजनबद्ध तयारी सुरू करण्यात आली. यात्रेच्या आयोजनासाठी स्वच्छता मोहीम, मंदिर परिसराची सजावट, वीज-प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तरुणांनी स्वतः पुढाकार घेत आर्थिक व श्रम दानाच्या माध्यमातून सर्व व्यवस्था उभारल्या. यात्रेदरम्यान पारंपरिक विविध सोंगे, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक, तसेच जागरण-गोंधळ यांसारख्या लोक परंपरा जिवंत करण्यात आल्या. या कार्यक्रमांनी ग्रामस्थांसह बाहेरगावाहून आलेल्या भाविकांचे विशेष आकर्षण ठरले. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. सामाजिक एकात्मता अधिक दृढ या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील एकजूट आणि सामूहिक सहभाग. जात, धर्म, वय या सर्व भेदांपलीकडे जाऊन ग्रामस्थांनी एकत्र येत हा उत्सव साजरा केला. यामुळे गावातील सामाजिक एकात्मता अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
खुलताबाद भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथे प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आरोग्य, वीज, सुरक्षा व्यवस्थेवर ठोस निर्णय घेण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, नगराध्यक्ष सय्यद आमेर पटेल यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि समाज बांधव उपस्थित होते. जयंती उत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्वंकष नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र वाघ यांनी मिरवणुकीतील आरोग्य व्यवस्थेचा मुद्दा ठळकपणे उपस्थित केला. मिरवणुकीदरम्यान २४ तास रुग्णवाहिका व वैद्यकीय पथके तैनात ठेवावीत, अशी त्यांनी आग्रही मागणी केली. यावर प्रशासनाने मिरवणुकीत रुग्णवाहिका व डॉक्टरांची व्यवस्था नक्की करण्यात येईल, असे आश्वासन दिले. उत्सव काळात वीज अखंडित राहावा यासाठी महावितरणला सूचना देण्यात आल्या. मिरवणूक मार्गावरील लोंबकळणाऱ्या विद्युत तारा दुरुस्तीचे आदेश दिले. नगर परिषदेला मिरवणूक मार्ग स्वच्छ ठेवणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आणि वाहतुकीची सोय सुरळीत राखण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन जाधव, माजी नगराध्यक्ष ॲड. एस. एम. कमर, नगरसेवक अनीस जागीरदार, ज्येष्ठ समाजसेवक आबेद जहागिरदार, शशिकांत मुसळे, दिनेश अंभोरे, कारभारी ढवळे, किशोर जाधव, रवींद्र ढवळे, विकास घाटे, अनिल घुसाळे, राहुल जाधव, अमोल ढवळे, स्वप्निल लोखंडे, महेंद्र घुसळे, राहुल बनकर, राजेश निकाळजे, मिलिंद जाधव, रोहित घुसाळे, छबू कांबळे आदींची उपस्थिती होती. खुलताबाद येथील बैठकीत बोलताना निरीक्षक धनंजय फराटे, समोर उपस्थित नागरिक. नियमांचे पालन करावे तहसीलदार संतोष गुट्टे आणि पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत उत्सव निर्विघ्न पार पाडण्यावर भर दिला. शहरातील सर्व मंडळे व नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करून सामाजिक ऐक्य जपत जयंती साजरी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
उंडणगावचे आरोग्य केंद्रच आजारी:जिल्हा परिषद सदस्यांची अचानक भेट, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
उंडणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन वाघ यांनी नुकतीच मंगळवारी सकाळी अचानक भेट दिली असता रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्यामुळे हे रुग्णालयच आजारी असल्याचे दिसून आले आहे. आरोग्य केंद्रातील अनेक गंभीर त्रुटींमुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी तपासणी दरम्यान ओपीडी नोंद रजिस्टर मेंटेन नसल्याचे व फार्म शिष्ट जवळचे रजिस्टर उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यामुळे येणाऱ्या रुग्णांची नोंद व्यवस्थित ठेवली जात नसल्याचे दिसून आले तसेच केंद्रातील स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत दयनीय असून परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरलेली दिसून आली. आरोग्य केंद्रात दोन डॉ. शुभम माने, डॉ. विशाल साळुंखे नियुक्त असतानाही तपासणी वेळी एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. त्यामुळे येथे आलेल्या रुग्णांना त्रास सहन करावा लागला. ऑपरेशन थिएटरमध्ये अत्यावश्यक सुविधा नसून फोकस लाइटच्या अभावी केवळ १० कॅटच्या सीएफएल बल्बच्या उजेडात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जात असल्याची गंभीर बाब समोर आली. लाईट नसल्यास मोबाईल टॉर्च च्या प्रकाशात शस्त्रक्रिया पार पाडाव्या लागतात असे कर्मचाऱ्यांनी सांगितले पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही अत्यंत खराब असून वापरास लागणाऱ्या पाण्याच्या हौदात कचरा साचलेला होता. त्याच दूषित पाण्याचा वापर होत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पंखे बंद अवस्थेत तसेच लाईट व्यवस्था निकृष्ट तसेच इमारतीतील स्लॅबचे प्लास्टर कोसळलेले आणि फरशा निघालेल्या अवस्थेत आढळले. आरोग्य केंद्रातील शौचालयांची स्थितीही दयनीय दिसून आली. चारपैकी दोन शौचालये पूर्णपणे बंद अवस्थेत आहेत तर उर्वरित दोन सुरू असली तरी त्यामध्ये प्रचंड अस्वच्छता असून रुग्ण व नातेवाईकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य केंद्रात किमान ६ कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचेही स्पष्ट झाले. या सर्व प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ केला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. जि.प. सदस्य वाघ यांनी या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल तयार करून संबंधित अधिकाऱ यांकडे सादर करण्याची माहिती दिली असून तातडीने सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांवर वचक नाही, काही कर्मचारी गैरहजर उंडणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून येथे मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. कर्मचाऱ्यांवर वचक नसून काही कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन वाघ यांनी दिली. डोळे दुखत असल्यामुळे मी नेत्रतज्ञांकडे तपासणीसाठी गेलो होतो. तपासणीस काही वेळ लागल्यामुळे मला उंडणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येण्यास उशीर झाला. तोपर्यंत जिल्हा परिषद सदस्य भेट देऊन निघून गेले होते. त्यानंतर मी येऊन रुग्ण तपासणी केली डॉ. शुभम माने आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उंडणगाव
मराठवाड्याचे कुलदैवत असलेल्या लासूरगाव येथील कुलस्वामिनी देवी दाक्षायणी मातेच्या यात्रोत्सवाला मंगळवारपासून (७ एप्रिल) उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवार, बुधवार या दोन दिवसांत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सुमारे २० हजार भाविकांनी देवी दाक्षायणी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. यात्रेच्या पहिल्या, दुसऱ्या दिवशी सकाळ, दुपार, संध्याकाळच्या आरतीचा मान दर्शन रांगेतील सहा सपत्नीक भाविक दांपत्यांना मिळाला. तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य दर्शन रांगेतील भाविकांना आरतीचा मान मिळत आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंद, उत्साह दिसून आला. वस्त्रालंकार पूजेच्या दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील जातेगाव दिंडीतील १५० महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम गत २० वर्षांपासून अखंडित सुरू आहे. वैजापूरचे तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे यांच्या हस्ते साड्या देण्यात आल्या. परंपरेनुसार तब्बल २५ वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथून २०० भाविकांची पायी पालखीसह दिंडी सोमवारी सायंकाळी दक्षनगरीत दाखल झाली. मंदिर प्रशासनाने महिला, पुरुष भाविकांना सोयीसुविधा दिल्या. मंगळवारी दिंडीतील सर्व महिला भाविकांना देवीला अर्पण केलेल्या वाहिक साड्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी सहायक व्यवस्थापक संतोष शेलार, आदिनाथ वाघुडे, स्वयंसेवक उपस्थित होते. पीआयने घेतला आढावा ः वैजापूरचे पीआय सत्यजित ताईतवाले यांनी मंगळवारी सायंकाळी श्री देवी दाक्षायाणी मंदिरात दर्शन घेतले. मंदिरावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेतील भाविकांची गर्दी, सोयीसुविधांबाबत मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे यांच्याकडून आढावा घेतला. उद्यापासून ५० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येईल. यात्रेत स्वतः लक्ष देणार. रात्री पेट्रोलिंग करणार, असे पीआय ताईतवाले यांनी सांगितले.
गंगापूर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यात आला. या जनता दरबारात नागरिकांनी पाणी, वीज, रस्ते, महसूल, शासकीय योजनांचा लाभ याबाबत विविध तक्रारी नागरिकांनी मांडल्या. आमदार बंब यांनी प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीचे आदेश देत अनेक प्रकरणे जागेवरच निकाली काढली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन काहींना आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे एका दिवसात उपलब्ध करून देण्यात आली. तसेच रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी आमदारांनी स्वतःच्या निधीतून मदत जाहीर केली, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांना कामात दिरंगाई करू नये, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही आमदार बंब यांनी दिला. गंगापूर शहरात आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत जनता दरबार झाला.
लासूर स्टेशन शिल्लेगाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मंथन परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. शाळेचे नाव उंचावले. यावर्षी इयत्ता पहिली ते सातवीतील २४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १८ विद्यार्थ्यांनी १०० पेक्षा अधिक गुण मिळवले. गुणवत्ता यादीत स्थान मिळाले. अभिजित सुनील तुपे इयत्ता पाचवी याने जिल्ह्यात सर्वाधिक २७० गुण मिळवले अन् प्रथम क्रमांक पटकावला. जिल्ह्यात तो प्रथम ठरला. अथर्व सीताराम राऊत इयत्ता चौथी याने तालुक्यात सर्वाधिक २२२ गुण मिळवले. गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला. तालुक्यात प्रथम ठरला. रुद्र लहू बोराडे याने २१२ गुण मिळवले. द्वितीय क्रमांक मिळवला. प्रतीक्षा रवींद्र चंदेल हिने १८२ गुण मिळवले. तृतीय क्रमांक मिळवला. आनंद भाऊसाहेब जाधव १८०, विराज विनोद चंदेल १६६, आदित्य प्रकाश चंदेल १६६, ईश्वरी सचिन राऊत १५६, अनिकेत बाळू राऊत १४६, तनुष्का जालिंदर बो-हाडे १२८, श्रावणी गणेश गव्हाणे १२२, सुशांत बाबासाहेब नरोडे ११८, सत्यम नितीन गव्हाणे ११२, आयुष सतीश जाधव ११२, पार्थ गोविंद बोऱ्हाडे ११२, प्रणव अरुण नरोडे १०४, वेदांत गणेश जाधव १०४, ईश्वर गणेश नरोडे १०२, स्वरा अनिल माताडे, लावण्य गणेश तुपशेंद्रे, सत्यजित सचिन गव्हाणे, श्रद्धा कृष्ण नरोडे, गौरी नरसु मदन, प्रसिक अमोल अमराव यांनी यश मिळवले आहेत. या यशामागे मुख्याध्यापक एम. के. बडोगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंदाचे परिश्रम आहेत. बोरकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रेरित केले. वर्गशिक्षिका अर्चना परिहार, पल्लवी गजेवार, ताराबाई जाधव, श्वेता रोकडे, मोहन बोरकर यांचे योगदान लाभले. राजूकाका वाघ यांच्या हस्ते प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास बक्षीस देण्यात आले. शिल्लेगाव शाळेचे गुणवंत विद्यार्थी. या वेळी शिक्षक, ग्रामस्थांची उपस्थिती होती.
पोफळा गावात दत्त मंदिरासह दोन वर्गखोल्या:स्मशान शेडचे भूमिपूजन
तालुक्यातील पोफळा गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध कामांचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी उत्साहात झाला. आमदार अनुराधा चव्हाण, महामंडलेश्वर दयानंद महाराज प्रमुख उपस्थित होते. श्री दत्त मंदिर बांधकाम, जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्गखोल्या, स्मशानभूमी शेड बांधकामाचा यात समावेश आहे. सदगुरु दयानंद महाराज यांनी कानिफनाथ गडाचा अधिक व्यापक, भव्य, आध्यात्मिक विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार अनुराधा चव्हाण यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे पोफळा परिसर येत्या काळात नंदनवनासारखा फुलेल, असा विश्वास व्यक्त केला. गावातील महिला भगिनींनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी सभागृह उभारणीची मागणी केली. आमदार अनुराधा चव्हाण यांनी त्वरित प्रतिसाद दिला. कानिफनाथ मंदिरासमोरील सभागृह बांधकामाची घोषणा केली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृह, कानिफनाथ गड रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावू, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थ, महिला मंडळींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. पोफळा गावातील स्मशानभूमीची दयनीय अवस्था प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मतदारसंघात मंजूर १२ स्मशानभूमी कामांपैकी एक काम पोफळा येथे मंजूर झाल्याची माहिती आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली. ग्रामस्थांच्या मूलभूत गरजांकडे संवेदनशीलतेने पाहणाऱ्या नेतृत्वाचे हे उदाहरण असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी विकास पाटील- गायकवाड, चंद्रकांत घुगे, बाजीराव गाडे, दादाराव पाटील पवार, ग्रामविकास अधिकारी श्री. चित्ते, पंचायत समिती बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. कंठाळे, श्रीमंत गायकवाड, संजय कावळे, रामेश्वर गायकवाड, आत्माराम गायकवाड, भागवत घुगे आदी उपस्थित होते.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली. या वेळी भाजपने ‘मोठा भाऊ’ म्हणून खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचा आणि सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी सर्व आवश्यक मदत करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. दरम्यान, काँग्रेसने या जागेवर आपला उमेदवार उभा केल्याने आता बारामतीची लढत प्रतिष्ठेची झाली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काँग्रेस बॅकफूटवर नाहीच! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, “बारामतीची जागा लढवण्यावर काँग्रेस अद्यापही ठाम आहे. ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने लढली जाईल आणि आमचा कार्यकर्ता मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे.’
तेलंगण व छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात सक्रिय असलेल्या नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. नक्षल्यांच्या ‘पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी’चा (पीएलजीए) प्रमुख कमांडर सोडी केशालू ऊर्फ ‘मल्ला’ ४० सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर शस्त्रास्त्रांसह शरण आला. या नक्षल सदस्यांनी एके-४७, इन्सास आणि एसएलआर यांसारखी आधुनिक शस्त्रे पोलिसांकडे सुपूर्द केली. केशालूवर २० लाखांचे बक्षीस जाहीर असण्याची शक्यता आहे. कोण आहे मल्ला.... यापूर्वी शरण आलेल्या जहाल नक्षल नेता बारसे देवानंतर केशालू हाच संघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचा प्रभावी नेता असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. वयाची चाळिशी ओलांडलेला केशालू कार्रेगुट्टा टेकड्यांच्या दुर्गम परिसरात २० ते ३० नक्षल सदस्यांच्या तुकडीचे नेतृत्व करत होता.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धविरामाच्या घोषणेमुळे शहरात मागील काही दिवसांपासून निर्माण झालेली इंधन आणि गॅसटंचाईची परिस्थिती आता निवळू लागण्याची चिन्हे आहेत. सर्वसामान्यांसह उद्योग जगताला या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्ववत होत असून नागरिकांनी गॅसची पॅनिक बुकिंग थांबवल्यास येत्या १० दिवसांत घरपोच सिलिंडर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच विस्कळीत झालेली पुरवठा साखळी आणि थांबलेली निर्यात पूर्वपदावर येऊन महिनाभरात उद्योग चक्र पुन्हा वेगाने धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर आता पेट्रोल व डिझेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले आहे. मागील काही दिवसांत पेट्रोल-डिझेल संपणार असल्याच्या अफवेमुळे नागरिकांनी रांगा लावून अतिरिक्त साठा करून ठेवला होता. त्यामुळे शहरातील अनेक पंप ड्राय झाले होते. मात्र, आता पुरवठा सुरळीत होत असल्याने परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर येत आहे. इंधनासाठी होणारी गर्दी ओसरली असून अनेक पंपांवर आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पॅनिक बुकिंग थांबल्यास परिस्थिती पूर्ववत होईल सध्या पुरेशा प्रमाणात डिझेल, पेट्रोल आणि घरगुती गॅस साठा उपलब्ध आहे. इंडस्ट्री आणि व्यावसायिक गॅस उपलब्ध करून देण्याबाबतही कंपन्यांना प्रशासनाकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ पॅनिक बुकिंगमुळे शहरात कृत्रिम टंचाई निर्माण होत होती. आता युद्ध थांबल्याने ग्राहकांची ही घाई थांबेल - प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी महिनाभरात उद्योग पूर्वपदावर येतील युद्ध थांबल्याने तणाव नक्कीच निवळला आहे, मात्र विस्कळीत झालेली पुरवठा साखळी आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे उद्योगचक्र पूर्ववत होण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागेल. तत्काळ होणारा सर्वात मोठा बदल म्हणजे कृषी उत्पादनांच्या निर्यातीला पुन्हा गती मिळेल. - उत्सव माच्छर, अध्यक्ष, सीएमआयए गॅसची पॅनिक बुकिंग थांबल्यास साठा पुरेसा जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणपणे दररोज १० ते १२ हजार घरगुती गॅस सिलिंडरची मागणी असते. मात्र, युद्ध आणि संभाव्य टंचाईच्या भीतीने मागील काही दिवसांपासून ही मागणी २० हजारांच्या पुढे गेली होती. या दुप्पट मागणीमुळे तिन्ही पुरवठादार कंपन्यांकडे शॉर्टेज निर्माण झाले होते व गॅस पोहोच करण्यासाठी १५ दिवसांपेक्षा अधिक वेळ लागत होता. नागरिकांनी भीतीपोटी केलेली ही पॅनिक बुकिंग थांबल्यास मागणी नियंत्रणात येईल. १५ दिवसांचा काळ अत्यंत महत्त्वाचा युद्धविरामाचा निर्णय सध्या १५ दिवसांसाठी असल्याने त्यानंतर काय परिस्थिती राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शहरातील उद्योग यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी किमान ३ आठवड्यांचा कालावधी लागणारआहे. होर्मुजची कोंडी सुटल्यानंतर औद्योगिक गॅस आणि तेलाच्या दरांवरही सकारात्मक होईल. - प्रीतेश चटर्जी, कन्व्हेनर, ईईपीसी इंडिया टाळेबंदी टळली, पण ‘बजेट’ कोलमडले होर्मुजच्या सामुद्रधुनीतून तेलवाहू जहाजांना परवानगी मिळाल्याने उद्योगांची टाळेबंदी तूर्त टळली आहे. मात्र, गॅस आणि इंधनाच्या वाढलेल्या किमतींमुळे उत्पादन खर्च (कॉस्टिंग) प्रचंड वाढला आहे. इंजिनिअरिंग व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील ‘हीट प्रोसेस’ महागल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे.
जागतिक हवामान बदलाचे पडसाद आता थेट भारताच्या मान्सूनवर उमटण्याची चिन्हे आहेत. प्रशांत महासागरातील न्यूट्रल (तटस्थ) स्थिती आगामी काळात अधिक तीव्र होणार असून, त्याचा थेट परिणाम भारताच्या पावसाळ्यावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेच्या नॅशनल एन्व्हायर्नमेंटल प्रेडिक्शन सेंटर आणि नोव्हा क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर यांसारख्या जागतिक संस्थांच्या रिअल-टाइम मॉनिटरिंगनुसार, प्रशांत महासागरातील तापमानाचा वेग चिंताजनक आहे. यामुळे यंदाचा उन्हाळा सुसह्य वाटला तरी पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र चिंतेचे सावट राहण्याची शक्यता आहे. यंदाचा उन्हाळा : तडाखा कमी, पण उकाडा जास्त : हवामानतज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार, ७ फेब्रुवारीपासून सुरू झालेला यंदाचा उन्हाळा तुलनेने सुसह्य असेल. जुलैपर्यंत प्रशांत महासागरातील स्थिती तटस्थ राहणार असल्याने तापमानात मोठी वाढ अपेक्षित नाही. महाराष्ट्रात सरासरी कमाल तापमान ४० अंश सेल्सियसच्या आसपास राहील. मात्र, किमान तापमानात किंचित वाढ झाल्यामुळे कडक उन्हापेक्षा हवेतील उकाडा अधिक जाणवेल. ७ जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. पावसाळ्याचे दोन भिन्न टप्पे: सुरुवातीला दमदार, नंतर घट पहिला टप्पा (जून-जुलै): या काळात परिस्थिती तटस्थ असल्याने पावसाची सुरुवात समाधानकारक आणि दमदार असेल. पहिल्या दोन महिन्यांतच पावसाची सरासरी गाठली जाईल. एल निनो : तापमान सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सियसने वाढल्यास एल निनो सक्रिय होतो. तटस्थ स्थिती एल निनोकडे झुकल्याने, ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान तीव्रता अधिक असेल. जागतिक हवामानाचा कणा मानल्या जाणाऱ्या प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील निनो ३.४ सेक्शनमधील तापमानावर सर्व गणित अवलंबून असते. अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता सध्याची तटस्थ स्थिती महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पावसासाठी पोषक आहे. याच काळात इंडियन ओशन इंडेक्स (भारतीय सामुद्रिक स्थिरांक) सकारात्मक स्थितीकडे सरकत असल्याने अरबी समुद्राकडून महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त असेल. मात्र, मान्सूनपूर्व काळात अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. -श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र. न्यूट्रल स्थिती : जेव्हा प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील तापमान सरासरी इतके असते, तेव्हा त्याला न्यूट्रल स्थिती म्हणतात. ला निना : तापमान सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सियसने घटल्यास ला निना सक्रिय होतो, जो भारतासाठी पावसाळ्यात कायम चांगल्या पावसाचे लक्षण मानला जातो. दुसरा टप्पा (ऑगस्ट-सप्टेंबर): जुलैअखेर परिस्थिती बदलण्यास सुरुवात होईल. निनो ३.४ ची तीव्रता वाढून अल निनो सक्रिय झाल्यामुळे पावसाचे प्रमाण घटेल. परिणामी, पावसाळा केवळ सरासरी गाठेल, परंतु सरासरीपेक्षा अधिक पावसाची अपेक्षा यंदा फोल ठरू शकते.
राज्य सरकार महावितरणचे 32 हजार कोटींचे कर्ज फेडणार:स्वतंत्र कंपनी आणि बिगर शेतीसाठी आयपीओ आणणार
राज्यातील वीज क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणाऱ्या अत्यंत धाडसी आणि दूरगामी निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. सततच्या तोट्यात आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या महावितरणची आर्थिक सर्जरी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. महावितरणचे विभाजन करून शेतीसाठी स्वतंत्र कंपनी आणि बिगर शेतीसाठी आयपीओ आणण्याच्या या निर्णयामुळे ऊर्जा क्षेत्रात आता खाजगी कॉर्पोरेट संस्कृतीचा उदय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महावितरणवर सध्या विविध पायाभूत योजनांसाठी घेतलेल्या सुमारे ३२ हजार ६७९ कोटी रुपयांच्या कर्जाचे ओझे आहे. हे कर्ज दायित्व आता थेट महाराष्ट्र शासन आपल्या अंगावर घेणार असून त्यासाठी १५ वर्षे मुदतीचे दीर्घकालीन सरकारी रोखे जारी केले जातील. यामुळे महावितरणची बॅलन्सशीट कोरी होणार असून कंपनीला नव्याने भरारी घेता येईल. या आर्थिक पुनर्रचनेमुळे महावितरणची पत (क्रेडिट रेटिंग) सुधारण्यास मोठी मदत होईल. मंत्रिमंडळाने “एमएसईबी सोलार ॲग्रो पॉवर लिमिटेड’ (एमएसएपीएल) या स्वतंत्र कंपनीच्या स्थापनेला हिरवा कंदील दिला आहे. ही कंपनी केवळ कृषी ग्राहकांना वीज पुरवठा आणि संबंधित सेवा देईल. शेतीला दिवसा वीज मिळणार, पण सरकारची तिजोरी ♥ओव्हरलोड एक्स्पर्ट व्ह्यू अशोक पेंडसे, वरिष्ठ ऊर्जा तज्ज्ञ प्रश्न : सर्वसामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या वीज दरांवर काय परिणाम होईल? - शेतीला मिळणाऱ्या विजेवर मोठ्या प्रमाणात “क्रॉस सबसिडी’ द्यावी लागते. सध्या ९ रुपये प्रतियुनिट असलेला पुरवठा खर्च सोलारमुळे ७ रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. मात्र, शेतकऱ्यांना १.५ रुपयाने वीज दिली तरी उर्वरित ३.५ ते ५ रुपये सरकारलाच द्यावे लागतील. जोपर्यंत सरकार ही सबसिडी देत नाही, तोपर्यंत नवीन कंपनी टिकणे कठीण आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, नवीन कंपनी झाली तरी वीज बिल वसुलीचे प्रमाण सुधारल्याशिवाय सर्वसामान्य ग्राहकांवरील बोजा कमी होणे कठीण आहे. प्रश्न : आयपीओ गुंतवणूकदारांसाठी किती फायदेशीर ठरेल. निधीचा विनियोग होईल? - आयपीओ आणण्यासाठी सरकार शेतीचा विभाग वेगळा करत आहे आणि जुनी थकबाकी स्वतःच्या अंगावर घेऊन “बाँड्स’द्वारे पैसे उभारत आहे. हे पैसे व्यवस्थेत सुधारणा करून आलेले नसून ते कर्ज घेऊन उभे केले जात आहेत. गुंतवणूकदारांसाठी हे किती फायदेशीर ठरेल हे सांगताना पेंडसे यांनी वसुलीच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अशोक खरात प्रकरण:बोगस आयकर अधिकारी पाठवून भक्तांची लूट
शिर्डीतील भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आतापर्यंत समता पतसंस्थेतील बोगस खात्यांचा भंडाफोड झाल्यानंतर आता भोंदू खरातने आपल्या भक्तांनाच लक्ष्य करत बनावट आयकर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची रक्कम उकळल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. मोठे व्यावसायिक व उद्योजक, जे भोंदू खरातचे भक्त होते, त्यांच्याकडे तो कथितरीत्या बनावट इन्कम टॅक्स अधिकारी पाठवत असे. हे बनावट अधिकारी छाप्याची भीती दाखवत कारवाईची धमकी देत आणि या दबावाखाली “तडजोड’ करण्याच्या नावाखाली मोठ्या रकमेची मागणी केली जात असल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे श्रद्धा व विश्वासाच्या नावाखाली जाळ्यात ओढलेल्या भक्तांनाच नंतर या पद्धतीने गंडा घालण्यात आल्याचे तपासात पुढे आले. या संपूर्ण पद्धतीची तुलना हिंदी चित्रपट “स्पेशल २६’ मधील बनावट धाडीच्या पॅटर्नशी केली जात आहे. अत्यंत नियोजनबद्ध रीतीने दबाव निर्माण करून पैसे उकळल्याचा संशय अधिक गडद होत आहे. खरातला न्यायालयीन कोठडी खरातला बुधवारी सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर न करता ऑनलाइन सुनावणी होऊन त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याच वेळी “एसआयटी’ने खरातच्या विरोधात दाखल तिसऱ्या बलात्काराच्या गुन्ह्यात त्याच्या अटकेच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केला असता न्यायालयाने त्यास मंजुरी दिली.
व्हिएतनाममधील दिग्गज ‘विनग्रुप’ कंपनीने राज्यात तब्बल ६.५ अब्ज डॉलर्स (सुमारे ५५,००० कोटी रुपये) गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारानुसार विनग्रुपची मुंबई महानगर परिसरात येत्या २७०० एकरवर स्मार्ट टाऊनशिप, इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा, चार्जिंग नेटवर्क, सौर ऊर्जा प्रकल्पात गुंतवणूक करेल. यामुळे २४,७०० थेट रोजगार निर्माण होतील, असा दावा आहे. असा आहे विनग्रुपचा गुंतवणुकीसंदर्भातील मास्टर प्लॅन स्मार्ट सिटीचा नवा अवतार: २,७०० एकरवर २ लाख लोकांसाठी स्मार्ट टाऊनशिप उभारणार. इलेक्ट्रिक क्रांती: ईव्ही निर्मितीसोबत राज्यभर चार्जिंग नेटवर्क व इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा सुरू करणार. पर्यटनाचा ग्लोबल टच : ८६५ एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क,झू व सफारी प्रकल्प. स्वच्छ ऊर्जा : ५०० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणार. महाराष्ट्राच्या स्थिर धोरणामुळे सकारात्मक परिणाम विनग्रुप टाऊनशिप, इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट, शिक्षण, आरोग्य व पर्यटन क्षेत्रांत उतरणार आहे. नीती आयोगाच्या लक्ष्यानुसार मुंबईचा जीडीपी वाढीसाठी हे इंधन ठरेल. जागतिक कंपन्या ‘चीन प्लस वन’ धोरण राबवत असताना व्हिएतनाममधील मोठ्या कंपनीने महाराष्ट्र निवडणे हे राज्याच्या स्थिर धोरणांचे यश आहे.
एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला (युवती) कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण झाले. एका तरुणावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. २५ मार्च रोजी पहिल्यांदा तक्रार झालेल्या या प्रकरणाबाबत शहर पोलिसांनी अत्यंत गोपनीयता पाळली होती. याप्रकरणी २५ मार्च रोजी देवळाली कॅम्प येथे, तर २ एप्रिल रोजी ७ आणि ३ एप्रिल रोजी १ असे एकूण ८ गुन्हे मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यात २ गुन्ह्यांतील ५ संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, तौसिफ अत्तार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांनी आधी मुलींची मुलाखत घेऊन त्यांची नोकरीसाठी शिफारस केली. मग ‘तुला माझ्यामुळेच नोकरी मिळाली’, असे वारंवार सांगितले. काही दिवसांनी तिच्यावर सुटी घेण्यासाठी दबाव टाकला. सुटीच्या दिवशी मुलींना विविध रिसॉर्टमध्ये घेऊन गेले. तेथे जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केला. ‘केरला स्टोरी’प्रमाणेच घडले सूत्रांनी सांगितले की, संशयितांनी ‘द केरला स्टोरी’ सिनेमाप्रमाणेच युवती व तरुणावर धर्मांतरासाठी वारंवार दबाव टाकला. तरुणाच्या मनात स्वधर्माबाबत द्वेष निर्माण करून त्याला विशिष्ट धर्माचे विधी करण्यास आणि त्या धर्माच्या परंपरांचे पालन करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुढील विधी व धर्मांतरासाठी त्याला मुंबईलाही नेण्यात आले होते. सुमारे चार वर्षे हा प्रकार सुरू होता. तरुणाने धारिष्ट दाखवून थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. आयटी कंपन्यांतील मुलींनी सतर्कता रहावे : आ. पडळकर पुणे | नाशिकला मोजक्याच आयटी कंपन्यात आहेत. तरीही तेथील उच्चशिक्षित मुलींना लक्ष्य करून त्यांच्यावर नियोजनबद्ध लैंगिक अत्याचार केले जात आहेत. पुणे तर आयटी हब आहे. येथेही असे काही घडत आहे का, याची कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी करणे व मुलींनी सतर्क राहणे गरजेचे आहे. नाशिकमध्ये तरुणाच्या धर्मांतराचा प्रकारही उघडकीस आला. त्यावर मकोकानुसार कारवाई अपेक्षित आहे, असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. नऊ पीडितांनी पोलिसांकडे तक्रार केली, असेही त्यांनी सांगितले. ९९२३३२३३११ वर तक्रार करा हे प्रकरण संवेदनशील आहे. तपासासाठी स्वतंत्र विशेष पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. ९९२३३२३३११ या क्रमांकावर तक्रार नोंदवता येईल. तक्रार करणारे तसेच अधिक माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील. -संदीप मिटके, सहायक पोलिस आयुक्त, नाशिक
धाराशिव जिल्ह्यातील शेतक-यांच्या खिशात उसाचे २००० कोटी!
सिंचन वाढल्याचा फायदा : यंदा विक्रमी ७१ लाख टन उसाचे गाळप, ६० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन सुभाष कदम धाराशिव : मागास जिल्हा, ही धाराशिवची ओळख आता पुसत चालली आहे. धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या खिशात यंदा २ हजार कोटी रुपये आले आहेत. जिल्ह्यातील साखर कारखाने, गूळ पावडर कारखान्यांनी यंदा विक्रमी ७१ लाख टन उसाचे गाळप […] The post धाराशिव जिल्ह्यातील शेतक-यांच्या खिशात उसाचे २००० कोटी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : आयपीएलच्या १९ व्या हंगामातील १४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने आले होते. या अटीतटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने थरारक विजय मिळविला. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २१० धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरुवात […] The post गुजरात टायटन्सचा थरारक विजय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ले तेहरान : वृत्तसंस्था पाकिस्तानने इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेपुढे युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला, त्यावेळी इस्त्रायल लेबनॉनवर हल्ले करणार नाही, अशी एक अट ठेवण्यात आली होती. मात्र इस्त्रायलने पाकिस्तानची ही अट फेटाळून लावली. आमचा युद्धविराम हा फक्त इराणशी आहे. आम्ही लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवणार, असे इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटले होते आणि अवघ्या […] The post युद्धविराम फसला? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील साखर कारखान्यांना गाळपानंतर प्रतिटन ७०० रुपयांपर्यंत तोटा होत असल्याचा दावा कारखानदारांकडून केला जात आहे. आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्यातील साखर कारखानदार सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची तयारी करत आहेत. या संदर्भात नुकतीच एक बैठक सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत साखरेच्या कमी विक्री दराबरोबरच इथेनॉल उत्पादनात वाढ, मागणीत घट […] The post साखर उद्योग संकटात! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निलंगा येथे ग्रामरोजगार सहायकांचा बेमुदत संप सुरू
निलंगा : प्रतिनिधी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी निलंगा तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी दि ८ एप्रिलपासून कामबंद संप सुरू केला आहे. तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी पंचायत समितीसमोर एकत्र येत निदर्शने केली व गटविकास अधिका-यांना निवेदन दिले. या निवेदनात शासनाने ग्रामरोजगार सहायक मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या ३ ऑक्टोबर २०२४ च्या निर्णयानुसार दरमहा ८ हजार […] The post निलंगा येथे ग्रामरोजगार सहायकांचा बेमुदत संप सुरू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पोहरेगाव येथे तब्बल २७ वर्षांनंतर शेतकरी बाजारचा शुभारंभ
रेणापूर : प्रतिनिधी पोहरेगाव परिसरातील नागरिकांचा अतिशय जिव्हाळ्याचा शेतकरी बाजार तब्बल २७ वर्षांनंतर गजबजला. या शेतकरी बाजाराचे उद्घाटन जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, रेणाचे व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, जिल्हा परिषद सदस्या आशाताई भिसे, मनीषा कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आला . तालुक्यातील पोहरेगावची ओळख पंचक्रोशीत ऊस पट्ट्यातील नावाजलेले गाव म्हणून ओळख आहे. २७ वर्षापूर्वी या […] The post पोहरेगाव येथे तब्बल २७ वर्षांनंतर शेतकरी बाजारचा शुभारंभ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कलेच्या क्षेत्रात करिअर करताना पाय जमिनीवर असावेत
लातूर : प्रतिनिधी तरुणांनी कॉलेज जीवनात शिक्षणासोबतच वेळेचे आणि संधीचे भान ठेवणे आवश्यक आहे. गेलेली वेळ आणि संधी पुन्हा येत नाही, त्यामुळे मिळालेल्या संधीचे सोने करा. विशेषत: कलेच्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर यश मिळवूनही तुमचे पाय जमिनीवर असायला हवेत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रूपलक्ष्मी शिंदे यांनी केले. शिव छत्रपती शिक्षण संस्थेच्या येथील राजर्षी […] The post कलेच्या क्षेत्रात करिअर करताना पाय जमिनीवर असावेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मनपाकडून क्षयरोग रुग्णांना न्युट्रिशनल सपोर्ट किटचे वाटप
लातूर : प्रतिनिधी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून दि. ७ एप्रिल रोजी महापौर जयश्रीताई सोनकांबळे, आयुक्त मानसी मीना, सभागृह नेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, नगरसेवक अॅड. फारुक शेख, उपायुक्त फड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.शंकर भारती, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन राऊत यांच्या उपस्थितीत १०० क्षयरुग्णांना फूड बास्केट देण्यात आले. लातूर जिल्हा क्षयरोग मुक्त […] The post मनपाकडून क्षयरोग रुग्णांना न्युट्रिशनल सपोर्ट किटचे वाटप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जनसामान्यांची मते जाणून काँग्रेसचे पदाधिकारी निवडले जाणार
लातूर : प्रतिनिधी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी, खासदार श्रीमती सोनिया गांधी यांनी संगठन सृजन अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत जनसामान्यांची मते जाणुन त्यातून काँग्रेसचे पदाधिकारी निवडले जाणार आहेत, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे केंद्रीय निरीक्षक हरमिंदरसिंग लकी यांनी बुधवारी सायंकाळी येथील काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. […] The post जनसामान्यांची मते जाणून काँग्रेसचे पदाधिकारी निवडले जाणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आजपासून ८ व्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्यास सुरुवात
लातूर : प्रतिनिधी भारत देशाचं उज्वल भविष्य ज्यांच्या हातात आहे, अशा आपल्या भारत देशातील प्रत्येक बालकाचा बौद्धिक विकास व्हावा, हे उत्कृष्ट उद्दिष्ट समोर ठेवून, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ८ वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा गुरूवार दि. ९ एप्रिलपासून सुरूवात होऊन तो २३ एप्रिल या कालावधीपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने निश्चित करून दिलेल्या थीमनुसार लातूर जिल्ह्यातील […] The post आजपासून ८ व्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्यास सुरुवात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालय अध्यक्षपदी लक्ष्मण मोरे
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालय लिमिटेड लातूर या संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध संचालक मंडळ माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आले आहे. त्यात नूतन चेअरमन म्हणून लक्ष्मण मोरे (खोपेगाव) तर व्हॉईस चेअरमन म्हणून भीमाशंकर बावगे (हासेगाव) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याबद्दल आशियाना बंगल्यावर बुधवारी नूतन संचालक मंडळ व […] The post जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालय अध्यक्षपदी लक्ष्मण मोरे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिक्षकांनी समर्पणाच्या भावनेतून ज्ञानदानाचे कार्य करावे
लातूर : प्रतिनिधी शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. शिक्षकांकडून समाजाला मोठ्या अपेक्षा असतात. शिक्षकांनी समर्पणाच्या भावनेतून ज्ञानदानाचे कार्य करणे हे समाज आणि राष्ट्र निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी केले. एज्युकॉन पुरस्काराने केंद्रे दाम्पत्याचा सन्मान करण्यात आल्याबद्दल येथील संगमेश्वर विद्यामंदिरच्यावतीने राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे सचिव […] The post शिक्षकांनी समर्पणाच्या भावनेतून ज्ञानदानाचे कार्य करावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या संपणार आहे. अशातच राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग घेतला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा फोन करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे बारामतीचा हा रणसंग्राम 'तुल्यबळ' होणार की 'बिनविरोध', याचा फैसला आता काँग्रेसच्या दिल्लीतील 'हाय कमांड'च्या निर्णयावर अवलंबून आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भावनिक ओलावा आणि राजकीय सौहार्द जपण्यासाठी महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार स्वतः रिंगणात आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्याने काँग्रेसने आकाश मोरे यांना मैदानात उतरवले आहे. या पार्श्वभूमीवर, सुनेत्रा पवारांनी सपकाळांशी चर्चा करून काँग्रेसने माघार घ्यावी, अशी विनंती केली आहे. काँग्रेसची 'वेट अँड वॉच' भूमिका सुनेत्रा पवारांच्या विनंतीनंतर काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, बारामती पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय हा पक्षाच्या दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाचा आहे. त्यामुळे उमेदवारी मागे घ्यायची की नाही, यासाठी दिल्लीतील श्रेष्ठींशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, उद्या ९ एप्रिल हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष काँग्रेसच्या भूमिकेकडे लागले आहे. 'वर्षा'वर खलबते; फडणवीसांकडून सुनेत्रा पवारांना पाठिंबा दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. सुमारे २० मिनिटे चाललेल्या या बैठकीत पोटनिवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली. यावेळी भाजप 'मोठा भाऊ' म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहील, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे निवडणुकीत भाजप सुनेत्रा पवारांना आवश्यक ती मदत करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामतीचा तिढा सुटणार का? दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. मात्र, शरद पवारांच्या पक्षाने या जागेवर उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी काँग्रेसने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. आता सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देऊन काँग्रेस 'बॅकफूट'वर जाते की आकाश मोरे यांच्या माध्यमातून महायुतीला तगडे आव्हान देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. बारामती पोटनिवडणुकीतून 6 उमेदवारांची माघार दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, आज दिवसभरात 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. विलास होळकर ,माऊली कांबळे, रजाक मुलाणी ,राहुल थोरात, अमोल कोकरे ,अशोक खामगळ यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. उद्या गुरुवार 9 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या किती जण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरुवातीला 53 वैध अर्जांपैकी सहा जणांनी माघार घेतल्याने सध्या तरी 47 उमेदवार रिंगणात उरले आहेत. मात्र उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बारामतीत मोठ्या राजकीय हालचाली होण्याची आणि चित्र बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवनिर्माण, सर्जनशील विचार यशाची गुरुकिल्ली:व्हीएनआयटी नागपूरचे डॉ. सतीश श्रीवास्तव यांचे प्रतिपादन
व्हीएनआयटी नागपूरच्या फायनान्शिअल इंजिनिअरिंग विभागाचे डॉ. सतीश श्रीवास्तव यांनी 'आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग'चे महत्त्व सांगितले. अमरावती येथील जी. एच. रायसोनी विद्यापीठात 'सदा ज्ञान व्याख्यानमाला' अंतर्गत सोमवारी त्यांनी हे प्रतिपादन केले. डॉ. श्रीवास्तव म्हणाले की, जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी नेहमी नवीन आणि रचनात्मक विचार करणे आवश्यक आहे. हीच 'आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग'ची कला तुम्हाला प्रत्येक कठीण परिस्थितीतून बाहेर काढते, तणाव, नैराश्य आणि निराशापासून दूर ठेवते आणि भविष्यात तुमची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास मदत करते. यावेळी कुलपती डॉ. विनायक देशपांडे अध्यक्षस्थानी होते, तर कुलसचिव डॉ. स्नेहिल जायस्वाल आणि विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. श्रीवास्तव यांनी प्रगतीसाठी नवीन विषय, नवाचार आणि स्वतंत्र विचारांची गरज असल्याचे अधोरेखित केले. हे सर्व 'बॉक्स'च्या बाहेर विचार करण्यातूनच शक्य होते. ते पुढे म्हणाले की, आपले विचार स्वतःचे, स्वतंत्र आणि स्पष्ट असावेत, त्यात कोणतीही दुविधा किंवा संदिग्धता नसावी. विचार केवळ मनात न ठेवता त्यांची अंमलबजावणी गांभीर्याने करावी. अनेकदा युवक काही नवीन करण्याचा निश्चय करतात, परंतु त्यांचे विचार स्वतंत्र नसल्याने ते दुविधेत अडकतात. परिणामी इच्छित यश मिळत नाही आणि त्यामुळे नैराश्य, तणाव व निराशा वाढते. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सतत 'आउट ऑफ बॉक्स' विचारसरणी ठेवणे गरजेचे आहे. व्याख्यानादरम्यान डॉ. श्रीवास्तव यांनी देशातील अनेक यशस्वी उद्योजकांच्या उदाहरणांचा उल्लेखही केला. कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. प्रकाश नारायण यांनी आभार मानले. सचिन देशपांडे, कुणाल बोरकर आणि अश्विनी राठी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
तिवसा तालुक्यातील जळका येथील पौराणिक खंडोबा मंदिर ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील समाधीस्थळापर्यंत जाणाऱ्या मुख्य 'दिंडी मार्गा'ची गेल्या १५ वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे गंभीर रुग्ण आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी तातडीने रस्ता नूतनीकरण आणि रुंदीकरण करण्याच्या मागणीसाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना निवेदन दिले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या मार्गावर केवळ तात्पुरते खड्डे बुजवण्याचे काम केले जाते, ज्यामुळे रस्त्याची स्थिती सुधारत नाही. हृदयविकार, कॅन्सर आणि गर्भवती महिलांना याच मार्गावरून अमरावती येथील 'अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल'मध्ये ने-आण केली जाते. मात्र, रस्त्यातील मोठ्या खड्ड्यांमुळे रुग्णांना रुग्णालयात पोहोचताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. निवेदन स्वीकारल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी यासंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच मागणीसाठी ९ ते १२ मार्च या कालावधीत माणिकग्राम धोत्रा येथे बेमुदत उपोषणही करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. या आंदोलनात प्रकाश चिचखेडे, अमोल वावरे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. जळका ते मोझरी हा मार्ग अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात किंवा वाहतूक कोंडी झाल्यास जड वाहनांसाठी एक महत्त्वाचा पर्यायी मार्ग म्हणून वापरला जातो. असे असूनही, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त या मार्गावरून १०० हून अधिक दिंड्या पायी प्रवास करतात, त्यामुळे वारकऱ्यांनाही या खड्ड्यांचा सामना करावा लागतो.
जायकवाडी धरणातील पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीसाठी समान चार आवर्तन दिले जातील. तसेच, पिण्याच्या पाण्यासाठी राखीव तरतूद करण्यात आली आहे. जायकवाडी धरणातील गाळ काढून केटी वेअर बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिली. पैठण येथील संतपीठात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खासदार डॉ. कल्याण काळे, राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, आमदार विजयसिंह पंडित, राजेश टोपे, अमरसिंह पंडित, रमेश बोरणारे, हिकमत उढाण, विलास भुमरे उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्री मेघना बोर्डीकर, आमदार नारायण कुचे, प्रकाश दादा सोळंके सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता अरुण नाईक, अधीक्षक अभियंता भरत शिंगाडे, निम्न दुधना प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती जगताप यांच्यासह बीड, परभणी, जालना जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. सिंचनासाठी जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यातून ज्याप्रमाणे चार आवर्तन दिले जातात, त्याचप्रमाणे उजव्या कालव्यातूनही चार आवर्तन देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यता दिली. याशिवाय, नांदूर मधमेश्वर कालव्यात उन्हाळी हंगामासाठी चार आवर्तन आणि निम्न दुधना प्रकल्पातून चार आवर्तन देण्यासही मंजुरी देण्यात आली. भविष्यातील सिंचन सुविधांच्या उपाययोजनांसाठी केटी वेअर बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. जायकवाडी धरणातील गाळ काढून पाण्याची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी राज्य स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी नांदूर मधमेश्वर कालव्याचे पाणी वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली. बीड, परभणी, जालना, संभाजीनगर येथील विविध मतदारसंघांतील लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या पाणी वाटपाच्या संदर्भात तसेच बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि त्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याबाबतच्या मागण्यांना बैठकीत मान्यता देण्यात आली.
अमरावती जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत तब्बल २० विभागांचा आढावा घेतला. कामात गुणवत्ता कायम ठेवा, नागरिकांना वेळेत सेवा द्या आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्यांच्या या मॅरेथॉन कामकाजामुळे जिल्हा परिषदेत सक्रियता दिसून येत आहे. गांधी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी मुख्यालयातील प्रत्येक विभागाची बारकाईने पाहणी केली. त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी त्यांनी एकेक करून सर्व २० विभागांचा आढावा घेतला. कामांची निर्धारित वेळेत पूर्तता होते आहे की नाही, जनतेला अपेक्षित सेवा मिळते आहे की नाही आणि बांधकाम व पाणीपुरवठा विभागांची कामे गुणवत्तापूर्ण आहेत की नाही, याची त्यांनी यावेळी चाचपणी केली. मंगळवारी दिवसभर सीईओंनी ११ विभागांचा आढावा घेतला. सकाळी १० वाजता सामान्य प्रशासन विभागाच्या बैठकीने आढाव्याला सुरुवात झाली. त्यानंतर प्रत्येक तासाला एक याप्रमाणे ग्रामपंचायत, वित्त, पाणीपुरवठा व स्वच्छता, प्राथमिक शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए), ग्रामीण पाणीपुरवठा, जलसंधारण आणि कृषी व पशुसंवर्धन विभागाचा आढावा उशिरा सायंकाळपर्यंत सुरू होता. बुधवारी दुसऱ्या दिवशी सीईओंनी जलसंधारण तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा उर्वरित आढावा घेतला. दुपारी १२ वाजता वाहन निर्लेखन विभागाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर काही बैठका अर्ध्या तासाच्या तर काही तासाभराच्या कालावधीत पार पडल्या. बांधकाम विभागाची बैठक सुमारे तासभर चालली. याव्यतिरिक्त लघुसिंचन, समाज कल्याण व दिव्यांग कल्याण, मनरेगा, ग्रामविकास व पंचायत राज, माध्यमिक व योजनांसाठी काम करणारा शिक्षण विभाग, एचव्हीपी लसीकरण मोहीम आणि कृषी विभागाचा उर्वरित आढावा घेण्यात आला. या सर्व बैठकांची सूचना सीईओंनी पदभार घेतल्याच्या पहिल्याच दिवशी सर्व विभागप्रमुखांना दिली होती. त्यामुळे प्रत्येक विभागप्रमुख आपली टिपणी व सहकाऱ्यांसह बैठकीला उपस्थित होते. सीईओंनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये त्यांच्याकडून त्या-त्या विभागाचे कामकाज जाणून घेतले. या आढावा बैठकांद्वारे सीईओ सत्यम गांधी यांनी केवळ विभागांचे कामकाज कसे चालले आहे, हेच जाणून घेतले नाही, तर प्रत्येक विभागप्रमुखाचा आवाका, त्यांचे अधिनस्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद तसेच संबंधित विभागप्रमुखाची प्रशासनावर किती पकड आहे, या मुद्द्यांचीही त्यांनी चाचपणी केली.
अमरावती येथे प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी बैठक बोलावली होती. धरणे, रस्ते आणि इमारतींसाठी शेतजमीन गमावून भूमीहीन झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींवर या बैठकीत तीन तास चर्चा झाली. मात्र, या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. यामुळे, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटेपर्यंत दरमहा त्यांच्यासोबत बैठक घेण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. सरकारला जमिनी देऊन भूमीहीन झालेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त समिती कार्यरत आहे. या समितीने अनेक आंदोलने केली असून, त्यामुळे काही प्रश्न सुटले आहेत. मात्र, पुनर्वसनाच्या धोरणांची योग्य अंमलबजावणी न झाल्याने अनेक समस्या अजूनही प्रलंबित आहेत. याच प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ही बैठक आयोजित केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात झालेल्या या बैठकीला बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज चव्हाण, काही प्रकल्पग्रस्त आणि जलसंपदा व इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान, जिल्ह्यातील जुन्या आणि नवीन प्रकल्पांमधील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असल्याचे समोर आले. बेंबळा, अप्पर वर्धा आणि लोअर वर्धा यांसारख्या प्रकल्पांमधील समस्या गेल्या वीस वर्षांहून अधिक काळापासून सुटलेल्या नाहीत, असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. प्रकल्प पूर्ण करताना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते, हे नेहमीचेच चित्र आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या बैठकीला संघटनेचे सचिव गौतम खंडारे, उपाध्यक्ष प्रा. निलेश ठाकरे, राजीव लोणकर, संजय गिद, मारोतराव भुजबळ, मंगेश इंगोले, श्रीकृष्ण बैलमारे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रद्धा उदावंत, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, अरखराव, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजभोज, कार्यकारी अभियंता गुरव तसेच इतर सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामातील दिरंगाई स्पष्टपणे दिसून आली. यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. वेळेअभावी केवळ २५ टक्के प्रकल्पग्रस्तांनाच आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळाली, तर ७५ टक्के प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर चर्चा होऊ शकली नाही. या मुद्द्यावरून उपस्थित प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी होती. आपल्या जमिनी आणि घरांचा त्याग करूनही समस्या सुटत नसल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष होता.
धारणी येथे महावितरणच्या एका सहायक अभियंत्याला ४ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. सुमारे ७० हजार रुपये मासिक वेतन असूनही त्याने सौर ऊर्जा कनेक्शनसाठी लाच मागितली होती. ही कारवाई बुधवारी सायंकाळी धारणी येथील महावितरण कार्यालयात करण्यात आली. सुशांत हरिदास बावनगडे (वय ४५, रा. धारणी) असे अटक करण्यात आलेल्या सहायक अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे सोलर पॅनल बसवण्याचा व्यवसाय करतात. ग्राहकांसाठी सोलर मीटर रिलीज ऑर्डर मिळवण्यासाठी त्यांना महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. तक्रारदारांनी मार्च महिन्यात चार ग्राहकांच्या घरी सोलर पॅनल बसवले होते. या चारही ग्राहकांच्या सोलर मीटर रिलीज ऑर्डर काढण्यासाठी त्यांनी महावितरण कार्यालयात अर्ज केला होता. ७ एप्रिल रोजी ते या संदर्भात चौकशी करण्यासाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी सहायक अभियंता सुशांत बावनगडे यांची भेट घेतली. बावनगडे यांनी तक्रारदाराला चार ग्राहकांच्या सोलर मीटर रिलीज ऑर्डर देण्यासाठी प्रत्येकी १ हजार रुपये याप्रमाणे एकूण ४ हजार रुपयांची लाच मागितली. या मागणीनंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, बावनगडे यांनी ४ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, आज सापळा रचण्यात आला. बावनगडे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडून अटक केली. त्यांच्याविरुद्ध धारणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक योगिता ठाकरे, चित्रा मेसरे, शैलेश कडू, आशिष जांभोळे आणि सतीश किटुकले यांच्या पथकाने केली. दरम्यान, अमरावती शहरातील साईनगर भागातही काही घरांवरील सौर ऊर्जा जोडणी पूर्ण झाली असून, त्यांना अद्याप मीटर रिलीज ऑर्डर मिळालेली नाही. ग्राहक आणि जोडणी करणारे व्यावसायिक दोन्ही बाजूंनी ऑर्डरची मागणी करत आहेत, परंतु विविध कारणे देत टाळाटाळ केली जात आहे. एका आमदाराचे स्वीय सहायक असलेल्या ग्राहकालाही अद्याप सोलर मीटर रिलीज ऑर्डर मिळालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मौजा चिंचोना येथील गट क्रमांक ३१२ मध्ये विद्युत तारांच्या घर्षणामुळे आग लागली. या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, काढणीस तयार असलेले गव्हाचे पीक आणि संत्रा बाग जळून खाक झाली आहे. भंडारज येथील युवा शेतकरी वैभव अशोक ठाकरे (वय २८) यांच्या दोन एकर शेतीत ही घटना घडली. त्यांनी संत्रा बागेत आंतरपीक म्हणून गव्हाचे पीक घेतले होते. आगीमुळे सुमारे एक एकरातील गहू पूर्णपणे जळून खाक झाला, तर सुमारे ३०० संत्रा झाडेही गंभीररीत्या बाधित झाली. विजेच्या लोंबकळणाऱ्या तारांमुळे हा अपघात घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या नुकसानीची भरपाई महावितरणकडून मिळावी, अशी मागणी पुढे आली आहे. घटनेनंतर शेतकरी ठाकरे यांनी भंडारज येथील महावितरण कार्यालयात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाखा अभियंता पवार यांनी तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. वैभव ठाकरे यांनी आमदार गजानन लवटे, उपविभागीय अभियंता तसेच तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जादू-टोणा आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचे एकामागून एक काळे कारनामे समोर येत आहेत. 'एसआयटी'च्या तपासात आता खरातचा एक अत्यंत धक्कादायक 'कांड' उघड झाला असून, तो आपल्याच श्रीमंत भक्तांना लुटण्यासाठी चक्क 'बोगस प्राप्तिकर (Income Tax) अधिकारी' पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, त्याच्या जाळ्यात अडकलेल्या आणखी ११ महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या राज्यात संतापाची लाट उसळली आहे. खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आतापर्यंत त्याच्यावर 13 गुन्हे दाखल झालेत. यातील 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे, 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे, तर एक गुन्हा ईडीने दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा आहे. त्यातच आता आपल्या श्रीमंत भक्तांना चित्रपट स्टाईलने लुबाडल्याचे समोर आले आहे. बनावट छापेमारी करून भक्तांना लुटायचा अशोक खरात केवळ भोंदूगिरीच करत नव्हता, तर त्याने लुटीचे जाळे सर्वत्र पसरवले होते. आपल्याकडे येणारे मोठे उद्योजक आणि व्यावसायिक भक्त हेरून तो त्यांच्याकडे बनावट प्राप्तिकर अधिकारी पाठवायचा. संबंधित भक्त मोठ्या संकटात सापडला आहे, असे भासवले जायचे आणि त्यानंतर प्राप्तिकर विभागाची कारवाई टाळण्यासाठी 'सेटलमेंट'च्या नावाखाली खरात त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचा. या 'बनावट रेड'मुळे अनेक उद्योजकांची मोठी फसवणूक झाली असून, आता हे भक्त पोलिसांत तक्रार करण्यासाठी पुढे येणार का, याकडे लक्ष लागले आहे. विकास दिवटे आत्महत्या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार सन २०२२ मध्ये शिर्डी संस्थानचे कर्मचारी विकास दिवटे यांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी खरातच्या अडचणी वाढणार आहेत. तत्कालीन पोलिस तपासात खरातचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले होते. मात्र, आता विकास दिवटे यांच्या भावाने पुन्हा तक्रार केल्यानंतर शिर्डी पोलिस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणाचा फेरतपास करण्यासाठी सरकारी वकिलांचा अभिप्राय मागवण्यात आला असून, लवकरच कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. तक्रारींचा आकडा १३ वर; एसआयटीकडून कसून चौकशी विशेष तपास पथकाने (SIT) खरातच्या कृत्यांचा पर्दाफाश करण्यासाठी स्थापन केलेल्या हेल्पलाईनवर तक्रारी येत आहेत. पती, मुले किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची भीती दाखवून महिलांना अघोरी कृत्यांच्या जाळ्यात ओढले जायचे. आता आणखी ११ पीडित महिलांनी धैर्याने पुढे येत खरातवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. खरातविरुद्ध आतापर्यंत एकूण १३ गुन्हे दाखल झाले आहेत. यात महिला अत्याचाराचे ८, तर फसवणुकीचे ४ गुन्हे आहेत. एसआयटी या सर्व तक्रारींची सखोल शहानिशा करत आहे. तपासादरम्यान खरातची १०० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असल्याचेही समोर आले असून, त्याचे आर्थिक व्यवहार एसआयटीच्या रडारवर आहेत.
गुजरातचे दिल्लीसमोर २११ धावांचे आव्हान
नवी दिल्ली : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएलमधील १४ वा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्णधार शुभमन गिल, जोस बटलर आणि वॉशिंग्टन सुंदरच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ बाद २१० धावा करत दिल्ली कॅपिटल्सच्या संघासमोर विक्रमी २११ धावांचे टार्गेट […] The post गुजरातचे दिल्लीसमोर २११ धावांचे आव्हान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात आरोग्य सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” या महत्त्वकांक्षी मोहिमेचे तळागाळापर्यंत व्यवस्थित नियोजन होऊन अंमलबजावणी व्हावी यासाठी गाव पातळीवरील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विभागीय कार्यशाळेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मंथन सभागृह, एमआयटी कॉलेज, बीड बायपास रोड, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सर्वसमावेशक व परिणामकारक करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. कार्यशाळेस विभागातील आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव रविंद्रन, सार्वजनिक आरोग्य विभाग आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहरी आरोग्य विभाग आयुक्त डॉ. सुनील भोकरे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर तसेच आरोग्य सेवा प्राथमिक संचालक डॉ. विजय कंदेवाड हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा, प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच “माझं गांव, आरोग्य संपन्न गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेत छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक परिमंडळातून एकूण-१३ जिल्ह्याचा समावेश असून जवळपास हजार अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.कांचन वानेरे, उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ, छत्रपती संभाजीनगर, डॉ.रेखा गायकवाड उपंसचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातुर तसेच डॉ कपिल आहेर उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ नाशिक यांच्यामार्फत करण्यात आले आहे. हे ही वाचा… क्रूरतेचा कळस:गर्भपातासाठी ‘पार्सल पाठवा’चा कोडवर्ड; भ्रूण नष्ट करण्याची जबाबदारी मातेवरच, गर्भपात रॅकेटचा मास्टरमाइंड डॉ. सुनील राजपूत शहरातील सातारा परिसरात उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंगनिदान आणि गर्भपात रॅकेटमध्ये अंगावर काटा आणणारे गौप्यस्फोट होत आहेत. या मृत्यूच्या खेळाचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) टीव्ही सेंटर भागात राहणारा डॉ. सुनील राजपूत असल्याचे तपासात पुढे आले आहे. तो मागील ७ ते ८ वर्षांपासून हे सिंडिकेट चालवत आहे. या प्रकरणात तो तुरुंगातून बाहेर आला की पुन्हा हाच प्रकार करायचा. सविस्तर वाचा…
मस्साजोगच्या सरपंचपदासाठी दिवंगत संतोष देशमुख यांची पत्नी अर्ज भरणार
बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला १ वर्षाचा कालावधी उलटला असून या प्रकरणातील आरोपी तुरुंगात आहेत. दुसरीकडे आता, येथील ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून मस्साजोगचा नवा सरपंच कोण याची उत्सुकता सर्वांनाच आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हेच गावचा कारभार हाती घेतील का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. […] The post मस्साजोगच्या सरपंचपदासाठी दिवंगत संतोष देशमुख यांची पत्नी अर्ज भरणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सातारा शहरातील देगाव फाटा परिसरातील आशीर्वाद कॉलनी येथे राहणाऱ्या नागरिकांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ७० लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी दोन जणांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वेता सिंग आणि मुकुंद कोचर(पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही)अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रीम जर्नी क्लब या ग्रुपचे अॅडमिन श्वेता सिंग आणि मुकुंद कोचर यांनी सांगितल्या प्रमाणे फिर्यादी नितीन विष्णू निकम त्यांची बहीण इशा गजानन जाधव आणि पत्नी रूपाली नितीन निकम यांच्या बँक खात्यावरून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. जास्त नफा मिळेल असे सांगून त्यांनी फिर्यादीसह नातेवाईकांकडून ६ डिसेंबर २०२५ ते ९ जानेवारी २०२६ दरम्यान विविध बँक खात्यांद्वारे एकूण ७० लाख,८८ हजार रुपये घेतले. मात्र गुंतवणुकीवर कोणताही परतावा न देता संबंधितांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी श्वेता सिंग आणि मुकुंद कोचर या दोघांविरोधात सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे करत आहेत. साताऱ्यात वस्तीगृह चालकास धमकी; प्रवेशावरून वाद सातारा शहरात मुलींचे वस्तीगृह चालविणाऱ्या तक्रारदारास मुलीस ऍडमिशन का दिले अशी विचारणा करत शिवीगाळ व मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जमीर गणी सय्यद (वय ५० रा.मल्हारपेठ,सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात अनिल उर्फ पपु बडेकर(रा.ढोरगल्ली,मल्हारपेठ,सातारा)याच्या विरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुलींचे वस्तीगृह चालवित असून दि.६ फेब्रुवारी २०२५ ते ९ जानेवारी २०२६ दरम्यान अनिल बडेकर यांनी वस्तीगृहात येऊन कावेरी कदम (रा. सदरबझार, सातारा) हिला प्रवेश कसा दिला, असा जाब विचारला. तसेच संबंधित मुलगी सध्या कोठे आहे याबाबतही त्यांनी विचारणा केली. यावेळी वाद वाढत गेल्याने बडेकर यांनी सय्यद यांना शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणी अनिल बडेकर यांच्या विरोधात कलम ३५१(२)३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे करत आहे. दारू पिण्यासाठी कन्ट्रक्शन व्यवसायिकाला मारहाण करत जबरी चोरी सातारा शहरातील बसाप्पापेठ परिसरात एका कन्ट्रक्शन व्यवसायिकाला दारू पिण्यासाठी पैश्याची मागणी करून मारहाण करत जबरीने पैसे हिसकावून घेतल्याची घटना दि.७ रोजी घडली आहे. याप्रकरणी सोमनाथ शरद चोरगे (वय ४२,रा.रविवार पेठ सातारा) यांनी विक्रम उमेश कांबळे (वय २४,रा. रविवार पेठ भाजी मंडई) आणि अनोळखी तीन व्यक्तींविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा एसटी स्टँड समोर असलेल्या शेतकरी भाजी मंडई येथील पंजाब नॅशनल बँकेच्या समोर दुपारी साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान विक्रम कांबळे याने फिर्यादी चोरगे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने कांबळे याने चिडून फिर्यादीला दोन कानाखाली मारून त्याच्या शर्टच्या वरच्या खिशातील ११ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच शिवीगाळ करत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर दुपारी सुमारे १२.३० ते १२.४५ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी बसाप्पापेठ, सातारा येथे आला असता,संशयित आरोपीने त्याच्या सोबत असलेल्या तीन अनोळखी इसमांसह फिर्यादीला पुन्हा हाताने मारहाण केली. यावेळी आरोपीकडे सुरीसारखे शस्त्र असल्याचीही माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,या घटनेची तक्रार पोलिसांकडे नोंदविण्यात आली आहे.घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बागवान करत आहेत.
पुणे जिल्ह्यात 'पुणे ग्रँड टूर – 2027' (सीझन 2) या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी 2027 रोजी या स्पर्धेचा शुभारंभ होईल आणि 31 जानेवारी रोजी समारोप होणार आहे. पुणेकरांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्पर्धेची सुरुवात आणि समारोप सुट्टीच्या दिवशी ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते, वाहतूक व्यवस्थापन आणि स्पर्धेच्या मार्गनिश्चितीसंदर्भात आयोजित प्राथमिक बैठकीत ते बोलत होते. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये आणि पुणेकरांना स्पर्धेचा आनंद घेता यावा, या उद्देशाने नियोजनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यानुसार स्पर्धेचा पहिला टप्पा मोशी प्राधिकरणातील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर ते हिंजवडी असा निश्चित करण्यात आला आहे. हा मार्ग आधुनिक आयटी हब आणि निसर्गरम्य मुळशी परिसर यांचा सुंदर संगम अनुभवण्याची संधी देईल. स्पर्धेचे टप्पे पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत: या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वैभवाची झलक एकाच व्यासपीठावर अनुभवायला मिळणार आहे. सिंहगड परिसर, सासवडचा वारसा, जुन्नर-राजगुरुनगरचा ऐतिहासिक पट्टा तसेच लोणावळा-खंडाळ्याचा निसर्गरम्य घाट यामुळे स्पर्धेला विशेष आकर्षण लाभणार आहे. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि स्वयंसेवक व्यवस्थापनाबाबत सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना वाहतूक खोळंबा जाणवू नये यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच नियोजनबद्ध तयारी सुरू असून, त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षीच्या स्पर्धेमुळे पुण्याची ओळख जागतिक स्तरावर अधोरेखित झाली आहे. आगामी ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ ही स्पर्धा त्यापेक्षाही अधिक भव्य, नियोजनबद्ध आणि यशस्वी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. ही स्पर्धा केवळ क्रीडा उपक्रम न राहता पुणे जिल्ह्याच्या पर्यटन, क्रीडा आणि आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दल केलेल्या कथित अपमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी पुणे शहरातील स्वारगेट चौकात युवक काँग्रेसने तीव्र आंदोलन केले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यकर्त्यांनी संविधान बचाव आणि दलितांचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा दिल्या. यावेळी हिमंता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून प्रतीकात्मक 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले आणि त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. आंदोलनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने पोलीस प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप केला. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत आंदोलनात सहभागी झालेल्या युवक काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. युवक काँग्रेसने स्पष्ट केले की, हिमंता बिस्वा सरमा यांचे वक्तव्य केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून, संपूर्ण दलित समाजाच्या स्वाभिमानावर केलेला थेट हल्ला आहे. हे भाजप आणि संघाच्या मनुवादी व प्रतिगामी विचारसरणीचे उदाहरण असून, अशा वक्तव्यांमुळे समाजात द्वेष आणि विषमता पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांना बेकायदेशीरपणे राज्याबाहेर नेऊन अटक करण्याचा प्रयत्न हा लोकशाही मूल्यांवर गंभीर आघात असून, विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रकार असल्याचेही युवक काँग्रेसने नमूद केले. दलित समाजाचा अपमान आणि लोकशाहीविरोधी कृत्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशारा देत अशा घटनांविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे युवक काँग्रेसने म्हटले आहे. पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, देशातील सर्वात ज्येष्ठ दलित नेत्याबद्दल भाजपा मुख्यमंत्र्यांनी केलेली टिप्पणी ही भाजपची संस्कृती दर्शवते. मुख्य भ्रष्टाचाराच्या विषयाला बगल देऊन दुर्लक्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा सवाल त्यांनी केला. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश अबनावे, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे, प्रदेश महासचिव महेश म्हेत्रे, दिलीपसिंह देशमुख, भूषण रानभरे, प्रदेश सचिव निखिल मलके, विश्वजित जाधव, प्रदीप मेहकरे, अविनाश साळुंखे, अर्थव सोनार, पुणे शहर युवक काँग्रेसचे अभिजित चव्हाण, उपाध्यक्ष सद्दाम शेख, कुणाल काळे, पर्वती विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पुष्कर आबनावे, पुणे जिल्हा युवक काँग्रेस सचिव भूषण पाटोदकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोन ज्येष्ठ नागरिकांना ६० लाख रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर आणि अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत, कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर राहणाऱ्या ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ५४ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाली. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत संदेश पाठवला. त्यानंतर संपर्क साधून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवले. ज्येष्ठ नागरिकांनी चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले, मात्र त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसऱ्या एका प्रकरणात, कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी सहा लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. या संदर्भात ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक कदम या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुणे शहरात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. नुकताच मगरपट्टा सिटी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची १२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सायबर चोरटे अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत आहेत. दरम्यान, सायबर चोरट्यांनी एका तरुणाचा मोबाईल क्रमांक 'हॅक' करून त्याच्या बँक खात्यातून चार लाख ३९ हजार रुपये काढून घेतल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. या तरुणाने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला होता. चोरट्यांनी मोबाईलचा तांत्रिक ताबा घेऊन खात्यातून रक्कम दुसऱ्या खात्यात वळवली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पुणे महानगरपालिकेत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कडून होणाऱ्या गॅस पुरवठ्याबाबत महापौर मंजुषा नागपुरे यांनी नुकतीच एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शहरात गॅस पाइपलाइन विस्ताराला गती देण्याचे आणि सर्व भागांपर्यंत ही सेवा पोहोचवण्याचे निर्देश दिले. महापौरांनी विशेषतः ज्या भागांमध्ये अद्याप गॅस सेवा पोहोचलेली नाही, त्या भागांना प्राधान्याने जोडण्याच्या सूचना दिल्या. तसेच, सुरू असलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देत नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने सोडवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी महापौर नागपुरे यांनी स्पष्ट केले की, शहरातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, अखंड आणि सुलभ गॅसपुरवठा मिळावा, ही महानगरपालिकेची प्राथमिकता आहे. एमएनजीएल संदर्भात ही महत्त्वाची आढावा बैठक मंगळवारी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरातील सुरू असलेल्या गॅस पाइपलाइन कामांसह प्रस्तावित प्रकल्पांचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस एमएनजीएलचे वरिष्ठ अधिकारी, तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी एमएनजीएलकडून शहरातील विविध भागांतील कामांची सद्य:स्थिती, गॅस पाइपलाइनचे कव्हरेज आणि भविष्यातील विस्तार आराखडा याची माहिती सादर करण्यात आली. महापौर नागपुरे यांनी एमएनजीएल आणि महानगरपालिका यांच्यात समन्वय साधून पुढील कामे गतीने राबवली जातील असे सांगितले. पासपोर्ट सेवा केंद्रामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक व नागरी समस्यांवर पूर्वतयारी पुणे, बाणेर–पाषाण लिंक रोड येथे नव्याने सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे निर्माण होत असलेल्या वाहतूक कोंडी, पार्किंग, अतिक्रमण व परिसर वाहतूक व्यवस्थापनाच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने आज औंध क्षेत्रीय कार्यालय येथे संयुक्त समन्वय बैठक पार पडली. या बैठकीस औंध क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी विजय नायकल, पासपोर्ट कार्यालयाचे प्रतिनिधी जतिन कोटे, माजी उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका रोहिणी चिमटे, राहुल कोकाटे, बाणेर–पाषाण लिंक रोड परिसरातील नागरिक, तसेच पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यानंतर परिसरात उद्भवलेल्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, रस्त्यावरील अतिक्रमणे, पादचारी सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा आदी मुद्दयावर ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली, यात प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या समन्वयातून नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
कर्करोगावर अधिक परिणामकारक आणि कमी दुष्परिणाम असलेले उपचार विकसित करण्याच्या दिशेने बीव्हीजी लाइफ सायन्सेस लिमिटेडने महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. 'संयुग ७' या नव्या फायटो-औषध आधारित संयुगाने कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात आशादायक परिणाम दर्शवले आहेत. जनुकशास्त्र आणि अचूक उपचारपद्धती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ, येल विद्यापीठाचे (अमेरिका) प्राध्यापक डॉ. श्रीकांत माने यांनी या संयुगाच्या कार्यक्षमतेबाबत माहिती दिली. डॉ. माने पुण्यातील यशदा येथे आयोजित कर्करोग विषयक विशेष शास्त्रीय कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम बीव्हीजी लाइफ सायन्सेस लिमिटेड आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास बीव्हीजी समूहाचे संस्थापक हणमंतराव गायकवाड, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, बीव्हीजी लाइफ सायन्सेसच्या संचालिका डॉ. जयश्री द्रविड यांच्यासह प्रख्यात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. विनय थोरात, युरोलॉजिस्ट डॉ. सुरेश पाटणकर आणि विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे विभागप्रमुख उपस्थित होते. साताऱ्याहून डॉ. प्रतापराव गोळे हे खास या कार्यक्रमासाठी आले होते. एकूण २५० डॉक्टरांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. डॉ. माने यांनी सांगितले की, 'संयुग ७' कर्करोग पेशींची वाढ थांबवते, त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवते आणि त्यांचा शरीरातील इतर भागांमध्ये प्रसार (मेटास्टेसिस) होण्यास प्रतिबंध करते. तसेच, हे संयुग शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकटी देत कर्करोगविरोधी लढा अधिक प्रभावी बनवते. प्राथमिक निष्कर्षांनुसार, हे संयुग कर्करोग पेशींवर प्रभावीपणे परिणाम करते, तर सामान्य पेशींवर त्याचा अत्यल्प किंवा नगण्य परिणाम आढळतो. या संशोधनातून 'संयुग ७' कर्करोगाच्या वाढीशी संबंधित विविध जैविक प्रक्रियांवर प्रभाव टाकत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुरक्षित, लक्ष्यित आणि अधिक प्रभावी उपचार विकसित करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरू शकते, असे डॉ. माने यांनी नमूद केले. बीव्हीजी समूहाचे संस्थापक हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले की, बीव्हीजी लाइफ सायन्सेस गेल्या दशकभरापासून फायटो-औषध संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे. सातत्यपूर्ण प्रयत्नांतून कर्करोगासह इतर अनेक आजारांवर प्रभावी औषधे विकसित करण्यात यश मिळाले आहे. या संशोधनामुळे देशातील कर्करोग रुग्णांना नवी आशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परभणीहून पुस्तके घेऊन येताना शिक्षकाचा अपघाती मृत्यू
परभणी : परभणीहून गावाकडे परत येत असताना चारचाकी वाहनाच्या धडकेत खासगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक ज्ञानोबा सोपानराव कच्छवे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान परभणी-गंगाखेड महामार्गावर तरोडा परिसरात घडली. यामुळे दैठणा गावावर शोककळा पसरली आहे. शिक्षक ज्ञानोबा कच्छवे हे काही कामानिमित्त मंगळवारी स्वत:च्या दुचाकी(एमएच २२ एके ७०५०) […] The post परभणीहून पुस्तके घेऊन येताना शिक्षकाचा अपघाती मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एमपीएससी परीक्षेत सोलापूरचा डंका
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२४ चा अंतिम निकाल बुधवार दि. ८ एप्रिल रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लामकाने हे सर्वसाधारण तथा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम, तर सोलापूर जिल्ह्यातीलच आरती परमेश्वर जाधव या महिलांमधून राज्यात प्रथम आल्या आहेत. सदर परीक्षा दि. २७ ते २९ […] The post एमपीएससी परीक्षेत सोलापूरचा डंका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मानखुर्द येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथे सरकारी जमिनीवर असलेल्या अनधिकृत तब्बल बाराशे झोपड्यांवर पालिकेचा हातोडा पडला आहे. या निष्कासित जागेवर आता नागरिकांसाठी 'विज्ञान पार्क ' उभारण्यात येणार आहे. मुंबईला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला असून त्यातून देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने पडताळणी करून सरकारी जमिनी ताब्यात घेतल्या पाहिजेत, असे उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. मानखुर्द येथील शासकीय जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमणाबाबत, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामाचे निष्कासन करण्यात आले. पोलिस उपायुक्त समीर शेख, अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) पूर्व उपनगरे पद्माकर रोकडे यांच्यासह पूर्व उपनगरातील अतिक्रमण निष्कासन विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकऱ्यांसह ४०० कर्मचाऱ्यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. ११ एकर शासकीय जमीन मोकळी या मोहिमेद्वारे आतापर्यंत १२०० हून अधिक झोपड्यांचे निष्कासन करण्यात आले असून, ११ एकर शासकीय जमीन मोकळी करण्यात आली आहे. मोकळ्या केलेल्या जागेवर परत अतिक्रमण होऊ नये या करिता संरक्षक भिंत बांधण्यात येत असून, अतिक्रमण होणार नाही याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. सरकारी जमिनी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील - लोढा मुंबई महापालिकेच्या उपनगर अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागाने केलेल्या कारवाईबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुंबईला अधिक सुरक्षित, सुविधाजनक आणि सुंदर करण्याचा संकल्प केला आहे. या अनुषंगाने सह पालकमंत्री या नात्याने कब्जा केलेल्या सरकारी जमिनी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले. मालाड आणि मालवणी परिसरातही कारवाई सुरू - लोढा मुंबई परिसरात गेल्या काही वर्षांपासून भूमाफियांनी सरकारी जमिनींवर अनधिकृत बांधकामे करून मोकळ्या जागा हडप करण्याचा उद्योग सुरु केला असल्याचे शासनाच्या निदर्शनाला आले आहे. त्यातूनच अनेकदा बांगलादेशी आणि रोहिंग्यांना ही स्थानिक नेत्यांच्या मदतीने संरक्षण मिळत असल्याचे चित्र आहे. अशा परिसरात मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थांचा गोरखधंदा तसेच समाजविघातक कृत्याला खतपाणी मिळत असते. मालाड आणि मालवणी परिसरातही सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे निदर्शनाला आली असून तिथे ही अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कडक कारवाई सुरु असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली. अतिक्रमणमुक्त जमिनीवर विधायक उपक्रम राबवणार मुंबई आणि उपनगर मिळून हजारो एकर सरकारी जमिनीवर अनधिकृत बांधकामे असल्याचे शासनाच्या निदर्शनाला आले आहे. या सर्व जमिनींवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करून पुन्हा त्या जमिनी सरकारच्या ताब्यात आणण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी निवडक अतिक्रमण मुक्त ५०० एकर जमिनीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात विधायक उपक्रम राबवणार आहोत, असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. मानखुर्द येथील सध्या अतिक्रमण मुक्त करण्यात आलेल्या जमिनीवर नागरिकांसाठी सेवाभावी संस्थांच्या मदतीने अत्याधुनिक 'विज्ञान पार्क' उभारणार असल्याचेही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई उपनगरातील अनधिकृत बांधकामाच्या विरोधातील कारवाई अधिक कडक करण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा बहुप्रतीक्षित अंतिम निकाल बुधवारी (८ एप्रिल २०२६) अधिकृतरीत्या जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालात सोलापूर जिल्ह्याने राज्यात आपली निर्विवाद मोहोर उमटवली आहे. सोलापूरच्या विजय नागनाथ लामकाने याने सर्वसाधारण आणि मागासवर्गीय गटातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, महिला वर्गातून सोलापूरचीच आरती परमेश्वर जाधव हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विजय लामकाने याने राज्य सेवा मुख्य परीक्षेत ६२४ गुण मिळवत राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवले. त्याला उपजिल्हाधिकारी हे प्रतिष्ठेचे पद मिळाले आहे. दुसरीकडे, आरती जाधव हिने ६०१ गुणांसह महिलांच्या गटातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता, त्यानंतर आज मुलाखतीअंती आयोगाने अंतिम निकालाची अधिकृत घोषणा केली. ४६१ पदांसाठी उमेदवारांची शिफारस एमपीएससीतर्फे २७ ते २९ मे २०२५ या कालावधीत राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चे आयोजन करण्यात आले होते. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या निकालानुसार एकूण २० विविध संवर्गांतील ४६१ पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. आयोगाने निकालासोबतच प्रत्येक प्रवर्गातील शिफारसपात्र शेवटच्या उमेदवाराचा 'कट-ऑफ' (सीमांकन गुण) देखील जाहीर केला आहे. समांतर आरक्षणासह विविध मुद्द्यांवर न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहूनच हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तसेच दिव्यांग, अनाथ आणि खेळाडूंसाठीच्या आरक्षित पदांवरील शिफारशी सक्षम प्राधिकरणाच्या तपासणीनंतरच अंतिम मानल्या जातील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. नियुक्तीसाठी अटी व शर्ती आयोगाने या निकालाबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत:
राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असून, काँग्रेसने माघार न घेण्याची ठाम भूमिका घेतल्यामुळे आता या मतदारसंघात निवडणूक होणे जवळपास निश्चित झाले आहे. या राजकीय घडामोडींदरम्यान, आज बारामतीमधून 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातूनही 4 उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली असून, उद्या शेवटच्या दिवशी माघारीच्या सत्रात आणखी काय नाट्य घडते, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, आज दिवसभरात 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. सायंकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक कार्यालयाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याने आजची अंतिम आकडेवारी स्पष्ट होण्यास काहीसा वेळ लागणार आहे. सुरुवातीला 53 वैध अर्जांपैकी सहा जणांनी माघार घेतल्याने सध्या तरी 47 उमेदवार रिंगणात उरले आहेत. मात्र उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बारामतीत मोठ्या राजकीय हालचाली होण्याची आणि चित्र बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कॉंग्रेस ठाम या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना अधिकृत उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले असून, काँग्रेसने आतापासूनच निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातही काही उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 18 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. बारामतीत काँग्रेसने माघार न घेण्याचा पवित्रा घेतल्याने येथील लढत तिरंगी किंवा चुरशीची होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून चौघांची माघार दरम्यान, अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दुसऱ्या दिवशी चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, आता 18 उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. उद्या गुरुवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता असून, महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेले दोन अपक्ष अर्ज आणि शिवसेना ठाकरे सेनेचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांच्या उमेदवारीबाबत नेमका काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात प्रामुख्याने भाजप-महायुतीचे अक्षय कर्डिले आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे गोविंदराव मोकाटे यांच्यातच थेट लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
बांधकाम करताना उत्खनन करण्यात आलेले गौण खनिज त्याच जागी वापरले तर त्याला रॉयल्टी माफ करण्यात आली असून, बिनशेतीसाठी आता जिल्हाधिकारी यांच्याकडे जाण्याची आवश्यकता नसून ही प्रक्रिया दहा दिवसात ऑनलाईन करण्यात येणार आहे. याबरोबरच महापालिका आणि मिळकतपत्रावरील नोंदीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. राज्यभरातील बांधकाम व्यावसायिकांना भेडसावणारे प्रश्न आणि प्रलंबित मागण्यांबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात क्रेडाईच्या (CREDAI) प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बांधकाम करताना होणाऱ्या खोदकामासाठी आकारल्या जाणाऱ्या रॉयल्टीबाबत क्रेडाईने मांडलेले प्रश्न महसूलमंत्र्यांनी मार्गी लावले आहेत. सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, उत्खननानंतर निघालेले गौणखनिज जर त्याच बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी वापरले जात असेल, तर त्यावर कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही. यामुळे प्रकल्पाचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, रॉयल्टी भरण्याची प्रक्रिया आता अधिक सुटसुटीत करून ती सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिनशेतीची डिजिटल प्रक्रिया आता १० दिवसांत बिगरशेती (NA) परवान्यासाठी लागणारा वेळ व क्लिष्ट प्रक्रिया कमी करण्यासाठी महसूल विभागाने कालबद्ध कार्यक्रम आखला आहे. एनएची संपूर्ण पद्धत येत्या दहा दिवसांत पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. यामुळे गृहप्रकल्पांच्या कामात येणारे प्रशासकीय अडथळे दूर होतील. पुणे पॅटर्नचा राज्यभर विचार; डिजिटल ट्रेकिंगवर भर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी राबवलेली 'डिजिटल ट्रेकिंग प्रणाली' यशस्वी ठरली आहे. हीच पारदर्शक प्रणाली आता राज्यभर राबवण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. याशिवाय, कोणत्याही कागदपत्राचे रजिस्ट्रेशन (नोंदणी) झाल्यास त्याची नोंद तातडीने मिळकत पत्रिकेवर (Property Card) झालीच पाहिजे, ही क्रेडाईची मागणीही मंत्र्यांनी तत्वतः मान्य केली आहे. या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. याचाच भाग म्हणून मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे आणि जमाबंदी आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्यासोबत स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात आले असून, तांत्रिक बाबी लवकरात लवकर सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास क्रेडाईकडून व्यक्त करण्यात आला.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवड झालेल्या प्रिया शिंदे यांच्या कुणबी (ओबीसी) प्रमाणपत्रावर आक्षेप घेत कायदेशीर आव्हान दिल्याने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. संतोष साळुंखे व जयदीप मगर यांनी एडवोकेट दत्तात्रय घोडके यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून, जात पडताळणी प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तक्रारदारांच्या मते, ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेले कुणबी प्रमाणपत्र अत्यंत अल्प कालावधीत देण्यात आले. या प्रक्रियेत संबंधित महसूल यंत्रणेने नियमांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हे प्रकरण सध्या जिल्हा जात पडताळणी समितीकडे प्रलंबित असतानाच या प्रमाणपत्राला मान्यता देणे चुकीचे ठरेल, अशी ठाम भूमिका तक्रारदारांनी घेतली आहे. यामुळे प्रश्न केवळ प्रमाणपत्राच्या वैधतेपुरता राहत नाही, तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवले जात आहे. “जलदगतीने प्रमाणपत्र देणे म्हणजे नियमबाह्य निर्णयाला वैधतेचा मुलामा देणे का?” असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, 20 मार्च रोजी झालेल्या निवडीत प्रियाताई शिंदे अध्यक्षपदी, तर राजू भोसले उपाध्यक्षपदी विराजमान झाले. मात्र या निवडीदरम्यान भारतीय जनता पक्षाने राजकीय डावपेचांचा वापर केल्याच्या चर्चा आधीपासूनच रंगत होत्या. आता त्यात कायदेशीर वादाची भर पडल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, हा वाद पुढे दोन पातळ्यांवर परिणाम करू शकतो. एक म्हणजे, जात पडताळणी समितीने प्रमाणपत्र अमान्य केल्यास अध्यक्षपदावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. आणि दुसरे म्हणजे, या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेमधील सत्तासंतुलन पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता आहे. एकीकडे भाजपवर “दबावतंत्र” वापरल्याचे आरोप होत असताना, दुसरीकडे विरोधकांना या प्रकरणातून राजकीय संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा वाद केवळ कायदेशीर चौकटीत न राहता आगामी स्थानिक राजकारणाचा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. आता सर्वांची नजर जात पडताळणी समितीच्या निर्णयाकडे लागली आहे. तोपर्यंत, प्रिया शिंदे यांचे अध्यक्षपद हे राजकीयदृष्ट्या ‘स्थिर’ असले तरी कायदेशीरदृष्ट्या ‘अस्थिर’ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे ही वाचा… समरजीत घाटगे पुन्हा भाजपमध्ये:शशिकांत शिंदेंचा हसन मुश्रीफांना इशारा; सतेज पाटलांचीही टीका, 2029 साठी नवा गेमप्लॅन कोल्हापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना म्हणजे समरजीत घाटगे यांची भाजपमध्ये झालेली घरवापसी. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले घाटगे आता पुन्हा ‘कमळ’ हाती घेतल्याने राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत आहेत. मुंबईतील भाजप मुख्यालयात मंत्री चंद्रकांत पाटील आणि रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृत प्रवेश केला. या निर्णयापूर्वी आपण शरद पवारांना सांगूनच पाऊल उचलल्याचेही घाटगे यांनी स्पष्ट केले होते. सविस्तर वाचा…
युद्धविरामानंतरही इराणच्या तेल रिफायनरीवर हल्ला
तेहरान : इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच एक हल्ला झाला आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, आज इराणच्या लव्हान बेटावरील एका तेल शुद्धीकरण प्रकल्पाला (रिफायनरीला) लक्ष्य करण्यात आले. स्थानिक वेळेनुसार, सकाळी १०:०० च्या सुमारास हा हल्ला झाला आणि त्यानंतर रिफायनरीमध्ये आग भडकली. दरम्यान, कुवेतनेही असा दावा केला आहे की, युद्धविराम लागू असूनही, इराणच्या बाजूने ड्रोन हल्ला […] The post युद्धविरामानंतरही इराणच्या तेल रिफायनरीवर हल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धाराशिवमध्ये गॅस स्टॉक आणि वितरण व्यवस्थेत मोठी तफावत आढळल्याने निर्माण झालेल्या तणावातून ज्ञानेश्वर माळी या गॅस वितरकाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कंपनीच्या तपासणीनंतर समोर आलेल्या 1200 सिलेंडरच्या घोळासह सुमारे सात लाख रुपये किमतीच्या सिलेंडरची बेकायदेशीररीत्या विक्री केल्याच्या चर्चेमुळे माळी प्रचंड मानसिक दडपणाखाली होते. सद्यस्थितीत त्यांच्यावर सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांनी हाती घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील गॅस वितरक ज्ञानेश्वर माळी यांनी कंपनीच्या तपासणीत साठा आणि वितरण यामध्ये मोठी तफावत आढळल्याने निर्माण झालेल्या मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केला. गेल्या अनेक दिवसांपासून या वितरकाकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने गॅस कंपनीने त्यांचा पुरवठाही बंद केला होता, ज्यामुळे ते प्रचंड दडपणाखाली होते अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे धाराशिव जिल्ह्यात गॅस टंचाईची गंभीर समस्या जाणवत असतानाच, गॅस कंपनीच्या बैठकीत डीलरने हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तामलवाडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा नेमका उलगडा करण्यासाठी त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. नागपूरमध्ये संतप्त नागरिकांनी सिलिंडर पळवून नेले नागपूरच्या जरीपटका परिसरात गॅस सिलिंडर वितरणास होणाऱ्या विलंबामुळे संतापलेल्या नागरिकांनी चक्क सिलिंडर पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बराच वेळ रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त जमावाने हे टोकाचे पाऊल उचलले होते. मात्र माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणि समजुतीनंतर नागरिकांनी पळवून नेलेले सिलिंडर पुन्हा एजन्सीकडे सुपूर्द केले असून, या गोंधळामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बीडमध्ये गॅस एजन्सी बाहेर रांगा बीड जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक त्रस्त झाले असून, गेवराईसारख्या ग्रामीण भागात गॅस एजन्सी उघडण्यापूर्वीच ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. गॅस सिलिंडरचा सर्रास होणारा काळाबाजार आणि ग्राहकांचे ओटीपी परस्पर मिळवून केल्या जाणाऱ्या अवैध विक्रीमुळे ही कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रकारांची दखल घेऊन गॅस वितरणाचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दिवाळीपूर्वी मध्य प्रदेशात यूसीसी?
भोपाळ : डॉ. मोहन यादव सरकार मध्य प्रदेशमध्ये समान नागरिक संहिता (यूसीसी) लागू करण्याच्या तयारीत आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी मंत्र्यांना सांगितले की यूसीसीचा अभ्यास करा, ते राज्यात लागू करायचे आहे. या संकेतानंतर गृह विभागात प्रक्रिया वेगवान झाली आहे, कारण यूसीसी विधेयक तयार करण्याची जबाबदारी याच विभागाची आहे. सूत्रांनुसार, लवकरच […] The post दिवाळीपूर्वी मध्य प्रदेशात यूसीसी? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या उच्चशिक्षित मुलींवर नियोजनबद्धपणे लैंगिक अत्याचार होत असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. सध्या 'लव्ह जिहाद' सारखाच 'कॉर्पोरेट जिहाद' समोर आला आहे. त्यात आयटी कंपन्यांत कार्यरत असणाऱ्या उच्चशिक्षित मुलींना लक्ष्य करून त्यांच्यावर नियोजनबद्धपणे लैंगिक अत्याचार होत आहे. त्यामुळे मुलींनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, असे ते म्हणालेत. गोपीचंद पडळकर यांनी आज पुण्यात एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यात त्यांनी उपरोक्त खबळजनक आरोप केला. ते म्हणाले, नाशिक हे आयटी हब नसले तरी तिथे काही आयटी कंपन्या आहेत. पुणे हे मोठे आयटी हब आहे. आयटी कंपन्यांमध्ये काही गैरप्रकार घडत असल्यास संबंधित कंपनी अधिकाऱ्यांनी त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. नाशिक येथील एका कंपनीत एका तरुणाचा धर्मांतराचा प्रकारही समोर आला आहे. नाशिकच्या कंपनीचे दिले उदाहरण नाशिकमधील एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत मुलींना लक्ष्य करून त्यांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचा दावाही पडळकर यांनी यावेळी केला. ते म्हणाले, सदर कंपनीत १३० कर्मचारी काम करतात. लैंगिक अत्याचारामुळे अनेक मुलींनी नोकऱ्या सोडल्या. पण त्यातील नऊ पीडित मुलींनी धाडस दाखवून पुढे येत पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मागील दोन ते तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असून हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. टीम लीडर्सना मुलींना जाळ्यात अडकवण्याचा टास्क राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने भोंदू अशोक खरात प्रकरण बाहेर आले. त्यानंतर नाशिक पोलिसांनी आणखी एक प्रकरण शोधून काढले आहे. सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) नेमली आहे. कॉर्पोरेट कंपनीच्या संदर्भात टीम लीडर्सना टास्क ठरवून दिला जात असे. ते मुलींची मुलाखत घेऊन नोकरीसाठी शिफारस करत आणि त्यानंतर त्यांच्यावर दबाव टाकत. नोकरी कोणी लावली हे सांगणे, सुट्टी देण्यासाठी दबाव टाकणे, तसेच विविध रिसॉर्टमध्ये सुट्टीच्या दिवशी फिरावयास घेऊन जाणे असे प्रकार घडत होते. इमॅजिका येथे कंपनीतील मुलींना फिरण्यास घेऊन जाण्याच्या बहाण्याने एका तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर तिघांनी नियोजनबद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपींवर मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
व्हीडीओमध्ये कोणती बाई बेशुद्ध दिसते?
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिलांना भोंदूबाबांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. महिलांनी भोंदूबाबांकडे जाणे बंद करावे. हे लोक स्वत:ला ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, पार्वती असे काहीही म्हणतात. आपण त्यांच्या बोलण्याला बळी पडू नये. राज्यात सध्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यासंबंधीचे अनेक […] The post व्हीडीओमध्ये कोणती बाई बेशुद्ध दिसते? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अशोक खरातच्या अश्लील व्हीडीओंची १५ ते २० रुपयांमध्ये विक्री
नाशिक : प्रतिनिधी भोंदू अशोक खरात आणि महिलांचे आक्षेपार्ह व्हीडीओ सोशल मीडियातून हटवण्यात येत आहेत. एसआयटीच्या सायबर टीमने तब्बल चार हजारपेक्षा अधिक लिंक्स सोशल मीडियावरून डिलिट केल्या आहेत. मात्र, त्यापूर्वी या अशोक खरात पीडित महिलांच्या आक्षेपार्ह व्हीडीओची विक्री अवघ्या १५ ते २० रुपयांमध्ये केली जात असल्याचे उघड झाले आहे. १५ ते १७ अश्लील व्हीडीओ फेसबुक, […] The post अशोक खरातच्या अश्लील व्हीडीओंची १५ ते २० रुपयांमध्ये विक्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उमरदरी शिवारात तरुणाचा मृतदेह आढळला:अंगावरील जखमांमुळे खून झाल्याचे स्पष्ट, ओळख पटविण्याचे काम सुरू
सेनगाव तालुक्यातील उमरदरी शेत शिवारात असलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह बुधवारी ता ८ सकाळी आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सेनगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली. तरुणाच्या अंगावरील जखमा व चेहऱ्यावरील दगडाचे वार लक्षात घेता त्यांचा खून झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील उमरदरी फाट्याजवळ एक अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाची वय सुमारे पंचवीस वर्षे असून त्याच्या उजव्या हातावर सचिता व एक पाऊल गोंदलेले (टॅटू )काढला असून तर दुसऱ्या हातावर मॉम डॅड व आई वडील लहान मुलाचा हात धरलेला असे छायाचित्र (टॅटू) काढलेले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी योग्य त्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या. सदर तरुणाचा मृतदेह कुणाचा आहे निष्पन्न होईपर्यंत मृतदेह हिंगोली येथील शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. मृतदेहाच्या अंगावरील जखमांमुळे तसेच दगडाने डोक्यावर वार केल्याचे दिसून आल्याने सदर व्यक्तीचा खून झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक नागनाथ पाटील,जमादार जीवन मस्के, सुभाष चव्हाण, ओमनाथ राठोड,अमोल चिकने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणे केली आहे. मयताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत
नाशिक शहरात एकीकडे अशोक खरात प्रकरणाची चर्चा गरम असतानाच, आता कॉर्पोरेट जगताची मान शरमेने खाली घालायला लावणारा एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी (IT) कंपनीत कामाला असलेल्या १८ ते २५ वयोगटातील तरुणींचे लैंगिक आणि मानसिक शोषण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात आतापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी ६ आरोपींविरुद्ध कारवाई करत ५ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीतील टीम मॅनेजर आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हा किळसवाणा प्रकार केला. करिअरमध्ये अडथळे आणण्याची किंवा नोकरीवरून काढून टाकण्याची भीती दाखवून या तरुणींना जाळ्यात ओढले जात होते. कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी असलेले नियम पायदळी तुडवत या तरुणींचा विनयभंग आणि मानसिक छळ करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये पीडितांच्या धार्मिक भावना दुखावल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तपासासाठी 'एसआयटी'ची स्थापना या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता, नाशिक पोलिस आयुक्तांनी तातडीने संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या शोषणाचे बळी ठरलेल्या मुलींची संख्या २० ते २५ च्या घरात असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी एकूण ६ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यात ५ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी ५ पुरुषांना अटक केली असून, एक महिला आरोपी अद्याप फरार आहे. अटक केलेल्या पाचही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. कॉर्पोरेट संस्कृतीवर प्रश्नचिन्ह नाशिकसारख्या प्रगत शहरात आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आयटी हबमध्ये असा प्रकार घडल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले का? यामध्ये आणखी कोणा बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का? याचा तपास आता 'एसआयटी' करत आहे. न घाबरता पुढे या: पोलिसांचे आवाहन नाशिक पोलिसांनी पीडित तरुणींना धीर देत आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या छळाला ज्या मुली बळी पडल्या असतील त्यांनी संकोच न बाळगता तक्रार करण्यासाठी पुढे यावे. तक्रारदार तरुणींची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हे ही वाचा… भोंदूबाबा अशोक खरातला कोर्टाचा दणका; न्यायालयीन कोठडी:उद्या पुन्हा हजेरीचे आदेश; SIT पुन्हा ताबा घेणार, तपासाला वेग नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणात आरोपी अशोक खरात याच्याविरोधातील कारवाई अधिक तीव्र होताना दिसत आहे. आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. यासोबतच आरोपीला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सविस्तर वाचा…
डिजिटल जखमा कायमस्वरूपी राहतात
नवी दिल्ली : डिजिटल युगात तुमची गोपनीयता धोक्यात आली असेल, तर आता न्यायालय तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने एका प्रकरणात डिजिटल जखमा हा महत्त्वाचा शब्दप्रयोग करत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या मनमानी कारभारावर ओढलेले ताशेरे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. डिजिटल युगात मानवी जीवन अधिक सुलभ, अधिक वेगवान आणि अधिक खुले झाले आहे. मात्र […] The post डिजिटल जखमा कायमस्वरूपी राहतात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात शनिवारपासून‘पटपडताळणी’
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची अचूक नोंद आणि उपस्थितीची खात्री करण्यासाठी शिक्षण विभागाने ‘पटपडताळणी’ मोहिमेला वेग दिला असून ११, १५ आणि २२ एप्रिल २०२६ या तीन टप्प्यांत ही प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे बनावट विद्यार्थी व शाळा शोधण्यासाठी शिक्षण संचालनालयाने पुन्हा एकदा निर्णय घेतला असून यामध्ये इयत्ता दुसरी ते नववी आणि अकरावीच्या […] The post राज्यात शनिवारपासून‘पटपडताळणी’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चेक बाऊन्स तक्रार खटल्यापूर्वीच्या टप्प्यावर रद्द करता येत नाही
नवी दिल्ली : नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टच्या (कलम १३८) कायदेशीर अटी पूर्ण होत असतील, तर चेक बाऊन्सचा खटला सुरुवातीच्या टप्प्यावरच (खटल्यापूर्वी) रद्द करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या निकालात स्पष्ट केले आहे. संबंधित प्रकरण हे वैवाहिक वादातून उद्भवलेल्या समझोत्याशी संबंधित आहे. एका तक्रारदार महिलेच्या पतीला ५० कोटी रुपये देण्याचे मान्य झाले होते. या व्यवहारासाठी […] The post चेक बाऊन्स तक्रार खटल्यापूर्वीच्या टप्प्यावर रद्द करता येत नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी एसटीने सुट्टीत प्रवास करणा-या सर्वसामान्य नागरिकांसाठी खिशाला चाट देणारी बातमी दिली आहे. एसटी महामंडळानं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता आणि त्यामुळं होणारी गर्दी लक्षात घेता भाडेवाढ केली आहे. माहितीनुसार, साध्या बसेसच्या दरामध्ये दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. १५ एप्रिल ते १५ जून या काळासाठी ही वाढ करण्यात आली आहे. फक्त साध्या बसेसला […] The post लालपरीच्या तिकीट दरात वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत असून पार्थ पवार हे 9 एप्रिल रोजी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधीमुळे पवार कुटुंबातील आणखी एक चेहरा राष्ट्रीय पातळीवर सक्रिय होणार आहे. दिल्लीतील संसद भवनात होणाऱ्या या कार्यक्रमाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पार्थ पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या शपथविधीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांचा राजकीय प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज्यातील विविध घडामोडींमध्ये सक्रिय राहिलेल्या पार्थ पवारांना आता संसदेत काम करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यांच्या कामगिरीकडे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशपातळीवरही लक्ष राहणार आहे. दरम्यान, या शपथविधीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नवीन उर्जा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा आगामी राजकीय रणनीतीसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे. तसेच दिल्लीतील राजकारणात पक्षाची उपस्थिती अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणूनही या घडामोडीकडे पाहिले जात आहे. 9 एप्रिलचा दिवस पवार कुटुंबासाठी विशेष एकूणच, पार्थ पवार यांच्या राज्यसभेतील प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. शपथविधीनंतर ते संसदेत कोणती भूमिका बजावतात आणि पक्षासाठी कसे योगदान देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे 9 एप्रिलचा हा दिवस पवार कुटुंबासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी विशेष ठरणार आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका धक्कादायक घटनेत, एका महिलेने दुसऱ्या लग्नात अडथळा ठरणाऱ्या आपल्या ११ महिन्यांच्या बालकाची हत्या केली. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी महिलेला अटक केली आहे. यश रवींद्र पवार (वय ११ महिने) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. पूजा रवींद्र पवार (वय २२, रा. भांबार्डे) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. पूजाचा विवाह रवींद्र पवार यांच्याशी झाला होता. ८ मार्च रोजी पूजा आपल्या मुलासह घरातून निघून गेली होती. पत्नी आणि मुलगा बेपत्ता झाल्याने रवींद्र पवार यांनी ८ मार्च रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. ५ एप्रिल रोजी पूजा जांबूत गाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने सांगितले की, मी झोपेत असताना यश ओट्यावरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच मी त्याचा मृतदेह पोत्यात भरून दगड टाकले आणि विहिरीत फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपास आणि शवविच्छेदन अहवालातील माहितीनुसार पोलिसांचा पूजावरील संशय बळावला. पोलिसांनी तिला पुन्हा ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. पूजाने पोलिसांना सांगितले की, मुलगा सतत रडत असे आणि मला दुसरे लग्न करायचे होते. मुलगा दुसऱ्या लग्नात अडथळा ठरत असल्याने मी त्याला कपडे धुण्याच्या दगडावर आपटून ठार केले. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून, त्यात दगड टाकून विहिरीत फेकून दिला. या कबुलीनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पूजाला अटक केली. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक निरीक्षक अशोक चव्हाण, उपनिरीक्षक नीळकंठ तिडके, पोलीस कर्मचारी विलास आंबेकर, नितीन भोस, किशोर शिवणकर आणि नीलम जाधव यांनी या प्रकरणाचा तपास केला.
मद्यधुंद चालकाची वाहनांना धडक:कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांचे अपहरण करण्याचा प्रयत्न
पुणे शहरातील वारजे भागात एका मद्यधुंद मोटार चालकाने चार ते पाच वाहनांना धडक दिली. त्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे वाहतूक विभागातील पोलिस शिपाई अमोल पिसाळ यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर हे न्यायालयीन कामकाजासाठी वारजे परिसरातून जात असताना, वारजे-एनडीए रस्त्यावर एका भरधाव प्रवासी मोटारीने पाच ते सहा वाहनांना धडक दिल्याचे त्यांनी पाहिले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक क्षीरसागर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मोटार चालकाचा पाठलाग सुरू केला. वारजे चौकाजवळ चालकाने एका टेम्पोला धडक दिल्यानंतर क्षीरसागर यांनी प्रसंगावधान राखून मोटार अडवली. त्यांनी वारजे माळवाडी वाहतूक शाखेतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना माहिती देऊन चालकाला ताब्यात घेऊन पोलिस चौकीत नेण्यास सांगितले. वाहतूक पोलिस मोटारीत बसल्यानंतर चालकाने मोटार पोलिस चौकीकडे न नेता दुसऱ्या मार्गाने भरधाव वेगाने नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच क्षीरसागर यांनी मोटार काही अंतरावर अडवली. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत चालकाने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. जगदाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्लॉट विक्रीमध्ये फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल दोन हजार स्केअर फुटचा मोकळा प्लॉट दाखवून त्या बदल्यात 48 लाख रूपये घेऊन प्लॉट न देता फसवणूक केलयाप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिष गिरीधरीलाल चौधरी (48), दिनेशकुमार गिरीधरीलाल चौधरी (45), सुरेश गिरीधरीलाल चौधरी (42रा) आणि उर्मिला सुरेश चौधरी (35, रा. वाल्हेकर वाडी, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरेशकुमारता राजी चौधरी (41, रा. स्वामी रेसिडेन्सी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात 48 लाखांच्या फसवणूक प्रकरणी तक्रार दिली आहे.
पीएमपी बस प्रवासात उलटीचा बहाणा करून एका महिला प्रवाशाच्या पिशवीतून सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेकडून ६ लाख ९० हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावरील वैदुवाडी परिसरात ही घटना घडली होती. ननिता दिनेश कांबळे (वय ३७, सध्या रा. विश्रांतवाडी, मूळ रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार महिला ३० मार्च रोजी हडपसर गाडीतळ ते चिंचवड या मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत होती. त्या वेळी शेजारी थांबलेल्या कांबळेने प्रवासात उलटी आल्याचा बहाणा केला. तक्रारदार महिलेचे लक्ष विचलित करून, तिच्या नकळत पिशवीतून सात लाख रुपयांचे दागिने चोरून नेले होते. दागिने चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेनंतर वानवडी पोलिसांनी तपास सुरू केला. हडपसरमधील शिंदे वस्ती परिसरात एक महिला दागिने विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विष्णू सुतार आणि अमोल गायकवाड यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ननिता कांबळेला ताब्यात घेतले. तिच्याकडून ६ लाख ९० हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत ननिता कांबळेने पीएमपी बसमधील प्रवासी महिलेचे दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहायक आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विठ्ठल चोमले, बालाजी वाघमारे, अर्शद सय्यद, अभिजित चव्हाण आणि आशिष कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की:ट्रिपलसीट दुचाकीस्वारासह तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर 'ट्रिपलसीट' दुचाकीस्वारांना अडवणाऱ्या वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेत पोलिसाच्या गणवेशाची पट्टी तुटली. या प्रकरणी दुचाकीस्वारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक शाखेतील पोलिस शिपाई सोहल शेख यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. नितीन रामदास कराळे (वय २८, दुचाकीस्वार) आणि संदीप दिनकर सोनवणे (वय ३४, रा. शेल पिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर घडली. पोलिस शिपाई शेख यांनी एकाच दुचाकीवरून ट्रिपलसीट जात असलेल्या तिघांना पाहिले आणि त्यांना थांबवले. चौकशी सुरू असताना दुचाकीस्वार आणि त्याच्या साथीदारांनी शेख यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. 'आम्ही एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत,' असे सांगत त्यांनी कारवाईला विरोध केला आणि पोलिस शिपाई शेख यांना धक्काबुक्की केली. ओैंध रस्ता परिसरात भरदिवसा घरफोडी पुणे शहरातील ओैंध रस्ता परिसरात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातून साडेचार लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एकाने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारादार तरुण ओैंध रस्त्यावरील श्री चेतन सोसायटीत राहायला आहे. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ते कुटुंबीयासोबत कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्याने कपाटातील साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते घरी परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत. शहर परिसात गेल्या काही दिवसांपासून भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील १६ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत एकाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस हवालदार एस माने तपास करत आहेत. या धक्काबुक्कीत शेख यांच्या गणवेशावरील पट्टी तुटली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक मोकाशी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात ३००० रुपयांनी वाढ
जळगाव : प्रतिनिधी इराण-अमेरिका यांच्यामध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या युद्धाला अखेर युद्धविराम मिळाला आहे. युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात मोठ्या घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सोने-चांदीच्या दरामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या दरात मोठा बदल झाला […] The post युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात ३००० रुपयांनी वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपूर लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेतील २२.७० लाख रुपयांच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा लावला आहे. या प्रकरणी नांदेड येथील २३ वर्षीय व्हेटरनरी विद्यार्थी रोहित मारोती दुय्येवार याला अटक करण्यात आली आहे. ऑनलाइन बेटिंगमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे त्याने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे तपासात उघड झाले आहे. ही घटना २९ मार्च रोजी पहाटे नागपूर स्थानकावर घडली. रायपूर येथील हरिशचंद चंदवाणी हे कुटुंबासह बिकानेर एक्सप्रेसने प्रवास करत असताना त्यांच्या पत्नीने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स डोक्याखाली ठेवून झोपल्या होत्या. गाडी नागपूर स्थानकावर थांबलेली असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या झोपेचा फायदा घेत पर्स लंपास केली. काही वेळाने पर्स बाथरूममध्ये रिकामी आढळल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, ज्यात एक संशयित व्यक्ती चोरी करून स्टेशनबाहेर जाताना दिसली. रॅपिडो बुकिंगमधून मिळालेल्या मोबाईल नंबरच्या आधारे तांत्रिक तपास करून पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. आरोपी नांदेडहून नागपूरकडे ट्रॅव्हल्सने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून ९ ते १० ट्रॅव्हल्स तपासल्या. रहाटे कॉलनी परिसरात संशयित दिसताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून रोहित दुय्येवार याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही, परंतु सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्याकडून १७.४३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
भारताने केली अणुऊर्जा संयंत्राने ‘क्रिटिकॅलिटी’ साध्य
कलपक्कम : अणुऊर्जा क्षेत्रात भारताने पुन्हा एकदा आपला डंका वाजवून संपूर्ण जगालाच आश्चर्यचकित केले आहे. तामिळनाडूतील कलपक्कम येथील अणुऊर्जा संयंत्राने क्रिटिकॅलिटी (क्रांतिकता) साध्य करून नुकता भारताच्या ऊर्जा क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. महत्वाचे म्हणजे, भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम याच गतीने पुढे जात राहिला तर, या क्षेत्रातही भारत आत्मनिर्भर होण्यास वेळ लागणार नाही. याचे महत्व म्हणजे, […] The post भारताने केली अणुऊर्जा संयंत्राने ‘क्रिटिकॅलिटी’ साध्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून नुकतीच बदली करण्यात आलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन केले. 'तुकाराम मुंढे यांची बदली रद्द झालीच पाहिजे' अशा घोषणांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला असून, मुंबईतील मंत्रालय परिसरातील आंदोलनानंतर आता नांदेडमध्येही या मागणीचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. राज्य सरकारने प्रशासकीय स्तरावर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा धडाका लावला असून, मंगळवारी सायंकाळी 11 अधिकाऱ्यांचे फेरबदल करण्यात आले. यापूर्वीच गेल्या आठवड्यात तब्बल 25 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, ज्यात अनेकांना महत्त्वाच्या मोक्याच्या जागांवर तर काहींना महामंडळे व प्राधिकरणांवर नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री सचिवालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी वर्णी लागली असून, या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे, आपल्या धडाडीच्या कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली आहे. मात्र, दिव्यांग विभागाचे सचिव म्हणून मुंढे यांनी घेतलेल्या लोकहितवादी निर्णयामुळे दिव्यांग बांधवांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी आदराची भावना असून, ही बदली रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी मुंबईतील मंत्रालय परिसरातील आंदोलनानंतर आता नांदेडमध्येही दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, मुंढे यांची नियुक्ती पुन्हा दिव्यांग विभागातच कायम ठेवण्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, नानादेड जिल्हाधिकारी कार्यालयात आज विधिमंडळ अंदाज समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीवेळी दिव्यांग बांधव तुकाराम मुंढे यांच्या बदलीवरून आक्रमक झाले होते. दिव्यांग बांधव आक्रमक झाल्याचे पाहून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महाराष्ट्रातील अवयवदान व अवयव प्रत्यारोपण चळवळ गतिमान करण्यासाठी राज्यात 'हब अँड स्पोक मॉडेल' राबवून अमरावती, नाशिक, पुणे, ठाणे, मीरा -भायंदर व मुंबई (वाडिया) येथे अवयव प्रत्यारोपण अधिक व्यापक होईल अशी यंत्रणा उभी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. आरोग्यमंत्री म्हणाले की, राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली पाहिजे आणि अधिकाधिक रुग्णांना वेळेत अवयवरुपी नवजीवन मिळाले पाहिजे. त्यासाठी शासकीय रुग्णालयांमधील अवयवदान प्रक्रिया अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. विशेषतः ब्रेन-डेड (मेंदू मृत) रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रभावी समुपदेशन करून अवयवदानासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणेची गरज आहे. अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाला मिळणारी नवी आशा आहे. हे पुण्याईचे आणि नवजीवन देण्याचे कार्य असल्याचा दृष्टिकोन समाजात रुजवला गेला पाहिजे, अवयवदान चळवळ अधिक लोकाभिमुख करण्याची गरज असून, दात्यांची संख्या मोठ्या वाढवण्यासाठी राज्यभर जनजागृती, समुपदेशन आणि संस्थात्मक यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील सर्व उपसंचालकानी अवयवदानाबाबत राज्यभर विशेष जनजागृती मोहीम राबवावी. संदर्भित रुग्णालयात अवयवदान समुपदेशन व मार्गदर्शनासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावा. आवश्यकतेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती/प्रशिक्षण करून प्रत्यारोपण सेवेला गती द्यावी. अवयवदान विषयक वर्कशॉप, जनजागृती मेळावा आणि प्रशिक्षण सत्रे नियमित आयोजित करावीत. राज्यातील ब्रेन-डेड प्रकरणांचा दर दोन महिन्यांनी आढावा घ्यावा अशा सुचना दिल्या आहेत. या बैठकीत संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती, संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक, औध सिव्हिल हॉस्पिटल पुणे , ठाणे सिव्हिल हॉस्पिटल, पं. भीमसेन जोशी हॉस्पिटल मीरा-भायंदर, या रुग्णालयानी अवयवदान आणि प्रत्यारोपण क्षेत्रातील कार्याचे सादरीकरण केले. बैठकीत वाडिया रुग्णालयाने लहान मुलांच्या लिव्हर ट्रान्सप्लांट क्षेत्रातील कामाचे सादरीकरण केले. तसेच टेलिमेडिसिनच्या माध्यमातून राज्यातील विविध रुग्णालयांना तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जात असल्याची माहिती दिली. राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी सहा प्रादेशिक हब तयार करून प्रत्यारोपण सेवा अधिक बळकट करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. बैठकीस राज्यातील सर्व उपसंचालक, वैद्यकीय अधिकारी व संबंधित तज्ज्ञ ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते.
शाश्वत नागरी विकास, औद्योगिक व पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात विन ग्रुप कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सोबत सामंजस्य करार केला. विन ग्रुप कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यात शाश्वत विकास, हरित ऊर्जा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गतिशील वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन आणि विन ग्रुपचे (आशिया ऑपरेशन्स) मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सान्ह चाऊ यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. विन ग्रुपचे महाराष्ट्रात येणे सन्मानाची बाब यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या विकासाच्या पार्श्वभूमीवर विन ग्रुपचे महाराष्ट्रात येणे ही आनंददायी आणि सन्मानाची बाब आहे. कंपनी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करत असून मुंबई व रायगड परिसर हा भविष्यात जागतिक स्तरावर स्पर्धा करणारा सर्वात गतिमान शहरी भाग ठरणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर सशक्त आणि गतिमान शहरी वातावरण निर्माण होईल. राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा गुंतवणूकदारांना पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन देत कोणतीही अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांसोबत तसेच थेट संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. मागील काही वर्षांच्या अनुभवावरून राज्य प्रशासन कोणतीही समस्या सोडवण्यास सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील निवडक ठिकाणी प्रकल्प या कराराअंतर्गत विन ग्रुपकडून पुढील दोन वर्षांत सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक प्रस्तावित असून सुमारे 5 हजार एकर क्षेत्रावर विविध प्रकल्प उभारले जाणार आहेत. या माध्यमातून सुमारे 24 हजार 700 थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील इतर निवडक ठिकाणी हे प्रकल्प साकारले जाणार आहेत. या करारानुसार स्मार्ट निवासी टाऊनशिप, इलेक्ट्रिक मोबिलीटी सोल्यूशन्स, सामाजिक व सार्वजनिक पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, पर्यटन व मनोरंज या क्षेत्रात विन ग्रुप गुंतवणूक करणार आहे. या करारानुसार मोठ्या प्रमाणावर स्मार्ट निवासी टाउनशिप उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. सुमारे 2,700 एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाची, पर्यावरणपूरक आणि एकात्मिक टाउनशिप विकसित केली जाणार असून सुमारे दोन लाख लोकसंख्येचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव असून मोबिलिटी-एज-अ-सर्व्हिस प्लॅटफॉर्मही विकसित केला जाणार आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर भर सामाजिक आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये विनस्कूलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा, विनमेकच्या माध्यमातून मल्टीस्पेशालिटी रुग्णालये तसेच व्ही ग्रीन मार्फत राज्यभर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग नेटवर्क उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 170 एकर क्षेत्राचा वापर होणार आहे. याशिवाय 500 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारून स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर भर दिला जाणार असून त्यासाठी सुमारे 1,200 एकर जमीन आवश्यक राहणार आहे. पर्यटन क्षेत्रालाही चालना देण्यासाठी सुमारे 865 एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा थीम पार्क, प्राणीसंग्रहालय आणि सफारी प्रकल्प उभारण्याची योजना आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातील पर्यटनवृद्धीसह मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. या कराराच्या वेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन, मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे, तसेच विन ग्रुपचे (आशिया ऑपरेशन्स) मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सान्ह चाऊ, व्हिएतनामचे महावाणिज्यदूत ले क्वांग बिएन, सल्लागार गोकुल कांत टी, अमन सिंग, वैभव ठाकूर आदी उपस्थित होते.

27 C