राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आज (दि. १७) सकाळी ११ ते १२.२० या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'लोककल्याण मार्ग' या निवासस्थानी भेट घेऊन दीड तास सखोल चर्चा केली. कोण काय बोलते, ते बोलू द्या.. मला जे करायचे ते करतो, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर दिली. पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यातील ही चर्चा सुमारे ८० ते १२० मिनिटे चालली. अधिकृतपणे ही 'सदिच्छा भेट' असल्याचे सांगितले जात असले, तरी सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी निवडणुकांमधील जागावाटप आणि महायुतीतील समन्वयावर यात सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. विशेषतः, मागील काही निवडणुकांमध्ये मित्रपक्षांकडून शिवसेनेला अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचा एक 'अंतर्गत अहवाल' शिंदे यांनी पंतप्रधानांसमोर मांडल्याचे समजते. काही विशिष्ट मतदारसंघांतील पराभवाचे विश्लेषण आणि आगामी निवडणुकीतील चुका टाळण्यासाठीची रणनीती यावर या बैठकीत भर देण्यात आला. नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे? अधिवेशन सोडून दिल्लीत जाण्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतूनच जोरदार प्रत्युत्तर दिले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शिवसेनेच्या खासदारांना भेटायला येत असतो, त्यांच्यासोबत काल बैठक झाली. आज पंतप्रधान मोदी यांनाही भेटलो. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील अनेक विषयावर चर्चा झाली. सकारात्मक चर्चा झाली. अधिवेशन सुरू असेल तेव्हा मी दिल्लीत येत असतो. तशीच ही सदिच्छा भेट होती. एकनाथ शिंदे म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी इराण आणी इस्रायल यांच्यातील युद्धाबाबत चर्चा केली. देशातल्या सगळ्यांनी एकसंघ राहिले पाहिजे. एनडीए संपूर्णपणे मोदींच्या पाठिशी आहे. दुबई, मस्कत, कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्याचे कामही केले आहे. मी मोदींना हेदेखील सांगितले की अनेक देशांशी तुमचे चांगले संबंध आहेत. देश जेव्हा अडचणीत असतात तेव्हा एकमेकांना मदत करतो. इराणजवळील होर्मुझ मार्गातून दोन जहाजे आली आहेत. याबाबतही चर्चा झाली आहे. कोण काय टीका करतंय यापेक्षा मला जे करायचे आहे ते मी करत असतो. मी टीकाकारांना माझ्या कामातून उत्तर देतो. पंतप्रधान मोदींनी युद्धात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणले, अशा जागतिक विषयांवर आणि देशाच्या विकासावर आमची चर्चा झाली. पाच राज्यांच्या निवडणुकीतही एनडीएला मोठे यश मिळेल, असेही शिंदे म्हणाले. संसदेत रंगली 'रिजिजू-शिंदे' केमिस्ट्री दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज संसदेत देखील गेले होते. तिथे त्यांची भेट केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांच्याशी झाली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही सोबत होते. रिजिजू यांनी श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख 'मेरा छोटा भाई' असा केल्याने या आपुलकीच्या संभाषणाची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यापूर्वी त्यांनी सभापती ओम बिर्ला यांची भेट घेऊन विविध संसदीय विषयांवर चर्चा केली.
राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता नव्या महाविद्यालयांना अनुदानित तत्वावर परवानगी न देण्याबाबतच्या धोरणात बदल करणे शक्य नाही. मात्र अनुदानित महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक भरती केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला मंत्री पाटील यांनी उत्तर दिले. मंत्री पाटील म्हणाले की, २००१ मध्ये राज्य सरकारने नव्या महाविद्यालयांना विना-अनुदानित तत्त्वावर परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्या धोरणानुसार महाविद्यालयांमध्ये सुमारे ८० टक्के विद्यार्थ्यांना विविध सवलती दिल्या जातात. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के शुल्क माफी, ओबीसी विद्यार्थ्यांना ५० टक्के तर मुलींना १०० टक्के सवलत दिली जाते. या व्यवस्थेमुळे महाविद्यालयांचा खर्च भागवला जात असल्याने सध्या अनुदानित धोरणात बदल करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र राज्यातील १२०० अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५४०० प्राध्यापक भरतीला मान्यता देण्यात आली आहे. तसेच विद्यापीठांमध्ये ७०० प्राध्यापकांची भरती होणार असून एकूण ६ हजारांहून अधिक प्राध्यापकांची भरती लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले. २००१ पूर्वी स्थापन झालेल्या ७८ महाविद्यालयांना अनुदान दिल्यास राज्याच्या तिजोरीवर किती आर्थिक भार पडेल याचा अहवाल तयार करून वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही, असे त्यांनी सांगितले. सदस्य जयंत पाटील यांनी जाहिरातीवरील खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना पाटील म्हणाले की, २०२० मध्ये जाहीर झालेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात २०२२ पासून सुरू झाली. २०२२ ते २०२५ या कालावधीत त्याची अंमलबजावणी करण्यात राज्य देशात आघाडीवर आहे. या धोरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी जाहिराती आवश्यक होती. त्यामुळे जाहिरातीवर खर्च झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे जर मुस्लीमांना त्रास होणार असेल तर तो हिंदूंना, बौद्धांना,जैन, पारशी, शीख आणि ख्रिश्चनांनादेखील होईल, अन् होणार नसेल तर कोणालाही होणार नाही, पण कालचे बिले हे सर्व धर्मांना त्रास देणारे आहे असे उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. भास्कर जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडले आणि त्याचबरोबर शिवसेनेची भूमिका म्हणून मी त्यालार पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेनेची भूमिका म्हणून आम्ही त्यांचे समर्थन केले आहे, त्यातून सरकारची लबाडी आमच्या तात्काळ लक्षात आली होती. आमच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही ती तात्काळ लक्षात आली. बाहेर चर्चा करताना सत्ताधाऱ्यांचे उथळ वक्तव्य करणारे काही लोकं पाळले गेले आहेत त्यांच्याकडून हे मुस्लीमांच्याविरोधात आणि हिंदूच्या रक्षण करणारे विधेयक आहे अशा चर्चा घडवल्या जात होत्या. प्रत्यक्षात बिलामध्ये कुठेही तसे काहीही नाही. त्यामुळे राडा करायला संधी मिळाली भास्कर जाधव म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांकडून काल एक शब्द चुकीचा गेला तो जायला नको होता. त्याचे मी समर्थन करणार नाही. त्यांना त्यांचवेळी मी माफी मागायला सांगत होतो पण सत्ताधारी पक्षाला जे अपेक्षित होते, त्यांना या बिलच्या माध्यमातून सभागृहात हिंदू-मुस्लीम प्रकारची राडेबाजी करायची होती, ते करायला संधी मिळाली. जितेंद्र आव्हाडांच्या एका वाक्यामुळे सत्ताधाऱ्यांना सभागृहात राडा घालायला संधी मिळाली हे खरे आहे. त्यामुळे समाजात मोठा राडा होऊ शकतो भास्कर जाधव म्हणाले की, अबु आझमी या बिलाबद्दल काय म्हणता यावर बोलणे मला काही महत्त्वाचे वाटत नाही. पण या बिलामुळे टार्गेट झाले तर सर्वच धर्म टार्गेट होतील, नाहीतर कुणीच टार्गेट होणार नाही. दोन धर्मातील मुले-मुली लग्न करू इच्छित असतील तर त्यांना 60 दिवस आधी अधिकाऱ्याला सांगावे लागेल. असे लग्न लपवाछपवी करत होत असतात. यामुळे समाजात मोठा राडा होऊ शकतो, हे एका धर्मासाठी नाही तर सर्वच धर्मांसाठी त्रासदायक होऊ शकते.
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील एका बड्या तांदूळ व्यापाऱ्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने राईस मिलर्सकडून कोट्यवधींची वसुली केल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांनी मंगळवारी विधानसभेत केला. आकाश अग्रवाल असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याने पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून संपूर्ण जिल्ह्याला वेठीस धरले आहे. त्याने शासकीय धानाचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू केला आहे. संबंधित व्यापाऱ्याकडे अरवा तांदूळ तयार करण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. असे असतानाही केवळ कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून 'उसणा' तांदूळ तयार केला जातो, जो सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी नियमानुसार ग्राह्य धरला जात नाही. तरीही शासकीय धानाची उचल करून तो तांदूळ खुल्या बाजारात चढ्या दराने विकला जात आहे. पुरवठा विभागाने या व्यापाऱ्याला दोनदा रंगेहात पकडूनही त्याच्यावर ठोस कारवाई का झाली नाही? असा सवाल पटोलेनी लक्षवेदीद्वारे केला. यावेळी त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचीही मागणी केली. कधी राष्ट्रवादी, कधी काँग्रेस, तर कधी भाजपच्या नेत्यांशी संधान साधून मंत्रालयातील कामे पदरात पाडून घेणे, हा आकाश अग्रवाल याचा जुना हातखंडा आहे. याच बळावर त्याने भाजपच्या एका माजी आमदाराच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. एवढेच नाही तर राईस मिलर्सकडून जमा केलेल्या वसुलीतून मुख्यमंत्र्यांना धनादेशही दिला, असा आरोपही नाना पटोले यांनी यावेळी केला. रेशनमार्फत निकृष्ट दर्जाच्या तांदळाचे वितरण राज्यातील गोरगरिबांना रेशन दुकानांमार्फत दिला जाणारा तांदूळ पौष्टिक असण्याऐवजी अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. राईस मिलर्स व पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार सुरू आहे, असे नाना पटोले याकडे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे याकडे लक्ष वेधताना म्हणाले. या प्रकरणी त्यांनी त्यांना धारेवरही धरले. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत स्थानिक धानाची भरडाई करून तोच तांदूळ वाटणे अपेक्षित आहे. मात्र, अधिकारी व व्यापाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे लगतच्या आंध्रप्रदेशातून निकृष्ट तांदूळ स्वस्तात आयात केला जातो. शासनाकडून मिळालेले दर्जेदार धान खुल्या बाजारात वळवून, त्याऐवजी आयात केलेल्या निकृष्ट तांदळाला वारंवार पॉलिश करून रेशन दुकानांमार्फत वितरित केले जात आहे. या निकृष्ट अन्नामुळे राज्यात, विशेषतः गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. कुपोषणामुळे सुमारे 2 हजार बालकांचा व अनेक गर्भवती महिलांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बदल्या का केल्या जात नाहीत? असा सवालही नाना पटोले यांनी या प्रकरणी उपस्थित केला सरकार अजित पवारांचा शब्द पाळणार का? नाना पटोले यांनी या प्रकरणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाची पायमल्ली केली जात असल्याचा आरोपही केला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोंदियाचे जिल्हा पुरवठा अधिकारी आगळे यांची त्यांच्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी बदलीचे आदेश दिले होते. पण मंत्रालयातील काही बड्या अधिकाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत आगळे यांना त्याच ठिकाणी दुसरी जबाबदारी दिली. त्यांच्या जागी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आघाव पाटील यांची नियुक्ती केली. अजित पवार आता हयात नाहीत, पण त्यांनी सभागृहात दिलेला शब्द सरकार पाळणार का? असा प्रश्नही पटोलेंनी यावेळी सरकारला केला.
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये अजूनही धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली दौ-यावर गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेण्याची शक्यता आहे. त्याचसोबत ते […] The post भाजप- शिंदेसेनेत धुसफूस? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील एका परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेत विद्यार्थी जखमी झाला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील ओतूर येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयात सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. सोमवारी सकाळी एका अल्पवयीन आरोपीने परीक्षा केंद्रात शिरून परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला. विद्यार्थ्याने हा वार हातावर झेलल्याने मोठी दुर्घटना टळली. पण त्यात तो जबर जखमी झाला. हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे सांगितले आहे. ओतूर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीसह इतर 4 जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेविषयी परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आला. कोयता हातावर लागल्यामुळे तिथे मोठा गोंधळ सुरू झाला. विद्यार्थ्यांचा आरडाओरडा ऐकूण आम्ही घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर आरोपी अकरावीत शिकतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ज्या मुलाच्या हातावर वार झाले, त्याच्यावर औषधोपचार करण्यात आलेत. त्यानंतर त्याने रायटरच्या मदतीने परीक्षा दिली. आरोपी व जखमी विद्यार्थ्यांत यापूर्वीही वाद झाल्याची चर्चा आहे. एकूण 13 शाळांचे हे परीक्षा केंद्र आहे. येथे सुरक्षेसाठी रोज पोलिस व आरोग्य केंद्राचे 2 अधिकार असतात. यापूर्वीही झाला हल्ल्याचा प्रयत्न दुसरीकडे, जखमी विद्यार्थ्याने आरोपीने यापूर्वीही आपल्यावर हल्ला केल्याचे सांगितले आहे. आरोपी व त्याच्या सहकार्यांनी गत 6 तारखेलाही माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, असे तो म्हणाला. पण मुख्याध्यापकांनी त्या दिवशी असे काहीही घडले नसल्याचा दावा केला. जखमी विद्यार्थी यापूर्वीही आपल्यावर असा हल्ला झाल्याचे सांगत असला तरी आमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसे काहीही दिसत नाही. तसे काही घडले असते तर पालकांनी आम्हाला द्यायला हवी होती. आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला असे काही घडल्याची माहिती नाही, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, प्रस्तुत घटना सकाळी 10.35 वा. घडली. त्यावेली वर्गात कोणताही शिक्षक किंवा कर्मचारी नव्हता. प्रस्तुत सेंटर हे या भागातील सर्वात मोठे आहे. आम्ही बेल वाजल्यानंतर मुलांना गेटमधून आत घेतले. त्यांचे हॉलतिकीट वर्गातच चेक केले. यापुढे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजनाही केल्या जातील. या प्रकरणी यापुढे गेटवरच हॉलतिकीट तपासून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाईल.
मुंबईमध्ये गॅस पुरवठा अतिशय सुरळीत आहे. ग्रामीण भागात थोडासा विस्कळीत झाला आहे, तो सुरळीत करण्याचा प्रयत्न येत्या काही दिवसांमध्ये केला जाईल. 25 दिवसांच्या गॅपने बुकींग केल्यावर सिलिंडर जरूर मिळत आहे. मविआ गॅसवर असल्याने त्यांना राजकीय गॅस पुरवण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, मविआमध्ये संजय राऊत ज्या पद्धतीने बोलत आहेत त्या पद्धतीने कुणीही बोलायला तयार नाही. अधिवेशन सुरू आहे जर खरेच इतका गॅस तुटवडा असता तर सर्व आमदार तिथे बोलले असते, पण हे फेक नरेटीव्ह पसरवण्याचे काम राऊत यांच्यामार्फत सुरू आहे. लोकांमध्ये अराजकता निर्माण झाली पाहिजे यासाठी राऊत प्रयत्न करत आहेत. तेव्हा उबाठा-राऊत गप्प होते नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानसोबत केली तेव्हा संजय राऊत आणि उबाठा गट शांत होता.जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत अपमानकारक वक्तव्य केले त्यानंतर देखील संजय राऊत आणि उबाठा गप्प आहेत.संजय राऊत यांनी या प्रकरणी आवाल उठवत जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करायला हवा होता. या प्रकरणी पत्रकारांनी प्रश्न विचारला पण त्यांनी बोलणं टाळले. मतांसाठी आव्हाड वारंवार अपमानकारक वक्तव्य करतात. त्यावेळीही राऊत गप्प होते. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गट छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान अशा पद्धतीने सहन करत औरंगजेब, अफजल खान यांचा उदोउदो करण्याचे काम करत आहे. राऊत मतांसाठी किती लांगूनचालन करणार याचे उदाहरण आज बघायला मिळाले आहे. पण महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. तुम्ही कितीही लांगूनचालन केले तरी उद्धव ठाकरे, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांना शिवरायांचे मावळे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. LPG पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू नवनाथ बन म्हणाले की, गॅसच्या बाबतीमध्ये ऑपरेशन सक्सेसफूल आणि विरोधक डेथ अशी अवस्था आहे. इराणमधून आपल्याकडे काल 3 जहाजे आली आहेत, आज एक जहाज पोहचत आहे. एलपीजीचा पुरवठा सुरळीत करण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू आहे. काही ठिकाणी जाणीवपूर्वक समाजवादी पार्टी आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून गॅसच्या टाक्या काळ्या बाजारात साठवण्याचे काम करण्यात आले होते, ते सुद्धा उद्ध्वस्त करणे सुरू आहे. पुन्हा एकदा हे सुरळीत करण्यात येईल.
जितेंद्र आव्हाड हे काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाविषयी काय बोलले त्यावर अध्यक्षांनी काय निर्णय घेतला यावर हा विषय संपलेला आहे. राज्याचे राज्यपाल असताना भगत सिंह कोश्यारी यांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला तेव्हा काल ओरडणारे लोकं गप्प का बसले होते, असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. त्यावेळी कोश्यारींना का हटवले नाही? याचे उत्तर सरकार देणार का? असा सवाल पटोले यांनी केला आहे. नाना पटोले म्हणाले की, राज्यामध्ये गॅस तुटवडा सुरू आहे. आम्ही गेले दोन आठवडे हे सरकारला सांगतो आहे. पण सरकार या प्रश्नावर पळ काढते आहे. सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री होते पण ते काही बोलले नाही. सरकारकडून मुलांचे शिक्षण बंद करण्याचे पाप सुरू आहे. मुख्यमंत्री माध्यमांसमोर म्हणतात गॅस तुटवडा कुठेही नाही. राज्यसरकार जनतेचा अपमान करत आहे. युद्धाचा आजचा 18 वा दिवस आहे. सरकारने पुढे येत बोलले पाहिजे काय खरे आहे ते लोकांना सांगितले पाहिजे. सरकार काळाबाजारात सहभागी आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री की सरकार कोण गॅसवर बसले आहे? असा सवाल पटोलेंनी केला आहे. दमणकारी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न नाना पटोले म्हणाले की, भाजपच्या विचारसरणीचे लोकांना काय वॉशिग मशीनमध्ये धुण्यात येते का? बाहेरील लोकं महाराष्ट्रात राज्यपाल बनून येतात तेव्हा ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दैवतांचा अपमान करण्यासाठी येतात का? असा सवाल पटोले यांनी केला आहे. सरकार धर्मस्वातंत्र्य विधेयक हे ताकदींच्या जोरावर लागू करू इच्छित आहे. महाराष्ट्रात दमणकारी व्यवस्था निर्माण करण्याचे काम फडणवीस सरकारकडून सुरू आहे. याचा आम्ही विरोध करतो नाना पटोले म्हणाले की, संविधानाने आम्हाला धर्म स्वातंत्र दिले आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे काम करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. पण यापूर्वी ज्यावेळी असे बिल थोपवण्यात आले त्याला जनतेतून विरोध करण्यात आला आहे. या बिलमधील 4-5 क्लॉज बद्दल या विधेयकाला विधीमंडळ समितीकडे पाठवावे अशी आमची मागणी होती. त्यातून चर्चा करत हे बिल एकमताने मंजूर करावे अशी आमची भूमिका होती. पण सरकारने दमणकारी व्यवस्था निर्माण करत काही जातींना काही धर्मांना टार्गेट करण्याचे काम सुरू केले आहे.पाशी बहुमताच्या आधारावर कायद्याच्या स्वरुपात हे जे सुरू आहे याचा आम्ही विरोध करतो. शिवसेनेच्या भूमिकेवर मी बोलू शकत नाही नाना पटोले म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचे आम्ही समर्थन केले असे काही नाही. आव्हाडांनी त्या प्रकरणी माफी सुद्धा मागितली. विधानसभा अध्यक्षांनी त्यावर भूमिका स्पष्ट करत त्यांना ताकीद सुद्धा दिली आहे. शिवसेना या बिलाच्या ना सोबत होते ना बिलाच्या विरोधात होते, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या भूमिकेवर आम्ही काही बोलू शकत नाही. त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचे मत वेगळे असे शकत नाही.
विधिमंडळाच्या अधिवेशनात सोशल मीडियावरील बदनामीकारक मजकुरावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. फडणवीसांनी अधिवेशनात तत्त्वज्ञान झाडताना 'कंसात' हे देखील स्पष्ट करावे की, ही कारवाई फक्त भाजपची बदनामी झाल्यावरच होणार का? असा बोचरा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत बोलताना सोशल मीडियाद्वारे कोणत्याही पुराव्याविना होणारी बदनामी टाळण्यासाठी पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. सोशल मीडियाचा वापर करून कोणत्याही पुराव्याविना बदनामी करणे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्याचा सामना करावा लागतो. महिलांना तर विशेषतः करावा लागतो. यासंदर्भात कायद्यात काही तरतूद करता येईल का? हे पडताळून पाहण्यासाठी राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन केली जाईल. त्यांच्या शिफारशीनुसार, पुढील कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. आता याच मुद्द्यावरून सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारेंची सोशल मीडिया पोस्ट काय? सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत बॉलिवूड चित्रपट 'लुटेरे' पोस्टर असून, त्यावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे, अनिल देशमुख, संजय राऊत यांचे फोटो एडिट करून लावले आहेत. या फोटोवर 'महाराष्ट्र के लुटेरे' असे नाव दिले असून, दिग्दर्शन उद्धव ठाकरे आणि संगीत शरद पवार असे एडिट केलेले आहे. 'दुजाभावा'च्या भूमिकेवर अंधारेंचा निशाणा सुषमा अंधारे यांनी लिहिले, सो कॉल्ड मुख्यमंत्री फडणवीस हे अधिवेशनात तत्त्वज्ञान झाडत असताना म्हणाले की, सोशल मीडियावर कुणीही बदनामीकारक मजकूर लिहिल्यास त्यावर कायदेशीर कारवाई होईल. पण फडणवीसांनी कंसात हे लिहिले पाहिजे की फक्त आणि फक्त भाजपाची बदनामी झाल्यावरच आम्ही कारवाई करू इतरांच्या कारवाईचा आम्ही आनंद घेऊ. विकृत संस्कारांची पिलावळ आवरून दाखवा सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांकडून होणाऱ्या ट्रोलिंगवर अंधारे यांनी अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या, जर खरंच कारवाई करण्याची हिंमत तुमच्यात असेल, तर सोशल मीडियावर वावरणारी भाजपची ही 'विकृत संस्कारांची पिलावळ' रोखून दाखवा. अशा पद्धतीने आपल्या आई-वडिलांचे आणि भाजपचे संस्कार दाखवणाऱ्यांना आवर घालण्याची हिंमत शासन दाखवणार का? असे आव्हान सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी महायुती सरकारने विधानसभेने पारित केलेल्या धर्म स्वातंत्र्य विधेयकावर जोरदार आक्षेप घेता आहे. प्रस्तुत कायद्याच्या नावातच विरोधाभास आहे. जबरी धर्मांतराला विरोध झाला पाहिजे यात शंका नाही. पण या विधेयकातील परिभाषा ही यामागचा धार्मिक ध्रुविकरणाचा उद्देश स्पष्ट करणारी आहे. विशेषतः कायद्यातील भोळी भाबडी व्यक्ती कोणती? याची व्याख्या सरकारने स्पष्ट करण्याची गरज आहे, असे ते म्हणालेत. काँग्रेस सचिव सचिन सावंत या प्रकरणी म्हणाले, भाजपातर्फे धर्मस्वातंत्र्य हक्काचे संरक्षण करण्यासाठी कायद्याचे विधेयक मांडले गेले आहे. मूलतः या कायद्याच्या नावातच विरोधाभास आहे. आपला धर्म कोणता असावा याचे संविधानिक स्वातंत्र्य यात अभिप्रेत नाही. त्यामुळे संविधानाच्या विरोधात हे विधेयक आहे हे स्पष्ट होते. जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला विरोध झाला पाहिजे यात शंका नाही. परंतु विधेयकातील परिभाषा ही यामागचा धार्मिक धृवीकरणाचा उद्देश स्पष्ट करणारी आहे. याअगोदर इतर काही राज्यांत असेच आणलेले कायदे हे न्यायालयीन चिकित्सेत अडकले आहेत. मग न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिली असती तर अधिक बरे झाले असते. भोळी भाबडी व्यक्ती कोणती? व्याख्या स्पष्ट करा ते पुढे म्हणाले, या कायद्याचा उद्देश आणि कारणे स्पष्ट करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन पाहिले तर त्याचे धर्मांतर होणार किंवा झाले ती व्यक्ती भोळी भाबडी आहे असे गृहीतक ठरवण्यात आले आहे परंतु संविधानात अल्पवयीन नसलेल्या व्यक्तीला सज्ञान म्हटले आहे. यातून अशा व्यक्तीला धर्मांतराबाबत केवळ सल्ला दिला तरी दुसरा व्यक्ती गुन्हेगार ठरवला गेला आहे. आता भोळी भाबडी व्यक्ती कोणती? याची व्याख्या सरकारने स्पष्ट केली पाहिजे. दुसरे गृहीतक म्हणजे व्यक्ती व कुटुंब सामाजिक व आर्थिक दुर्बलतेमुळे धर्मांतरास बळी पडतात. मग सामाजिक आणि आर्थिक दुर्बलता दूर करण्यासाठी सरकार काय करणार? हे स्पष्ट झाले पाहिजे. बहुतांश गुन्हेगारांची पार्श्वभूमी ही सामाजिक व आर्थिक दुर्बलच असते. मग गुन्हेगारांनाही भोळाभाबडा म्हणणार का? उद्या जनतेमधून मी भोळा भाबडा आहे आणि माझी पार्श्वभूमी आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल आहे. मी धर्मांतराला बळी पडू शकतो त्यासाठी शासनाने आर्थिक व माझ्या पुनर्वसनासाठी मदत करावी असे मुख्यमंत्र्यांकडे अर्ज आले तर शासन मदत करणार का? शासनाची जबाबदारी ती काय? जीवनसाथी निवडण्याचा अधिकार हिरावला जाणार सचिन सावंत यांनी यावेळी धर्म स्वातंत्र्य कायद्यामुळे नागरिकांचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार हिरावला जाणार असल्याचाही दावा केला. ते म्हणाले, भाजपातर्फे महिला व अनुसूचित जाती जमातीचे लोक आमिषे दाखवून झालेल्या धर्मांतराला वा लव्ह जिहादला बळी पडतात असे गृहीतक जाहिरपणे मांडले जाते. ढोल, गवार, क्षूद्र और नारी, सब ताडन के अधिकारी ही मानसिकता खरेतर मनुस्मृतीमधून आली आहे. महिलांना व अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना स्वतःची अक्कल नसते हे गृहीतक 21 व्या शतकात असूनही अजून वर्णभेद ,जातीभेद आणि महिलांना हीन लेखणारी मानसिकता हे किती खोलवर रुजलेली बाब आहे हे स्पष्ट करते. देशात मतदानाचा अधिकार हा 18 वर्षांच्या युवा व्यक्तींना देण्यात आला आहे. भारतीय कायद्यानुसार सज्ञान व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार आपला जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. परंतु त्यांचे हे स्वातंत्र्य या विधेयकामुळे हिरावून घेतले जाणार आहे. अल्पवयीन मुलींना कायद्याने संरक्षण आधीच दिले आहे. मतांच्या राजकारणासाठी अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात हिंदू धर्माचे दुष्टीकरण भाजपा तर करत आहेच पण आपली मनुवादी विचारधाराही अधोरेखित करत आहे. नाहीतरी गोळवलकरांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन केले आहेच, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर सध्या शहरात गॅस सिलिंडरचे दर 1750 रुपयांच्या घरात पोहोचले असून, भविष्यात ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, अशी भीती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केली आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आयातीवर परिणाम होत असून, आपण इतर देशांच्या दयेवर अवलंबून राहण्याऐवजी नैसर्गिक संसाधनांचा वापर करून आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. हर्षवर्धन जाधव म्हणाले की, भारताला लागणाऱ्या एकूण गॅसपैकी 50% गॅस आपण आयात करतो, तर 50% देशांतर्गत उत्पादित होतो. मुंबईपासून 140 किमी अंतरावर 'मुंबई हाय'मध्ये नैसर्गिक गॅसचा प्रचंड साठा उपलब्ध आहे. जर तेथील उत्खनन वाढवले आणि सध्या हजिरा गॅस लाईनद्वारे इतर उद्योगांकडे वळवला जाणारा गॅस काही काळासाठी घरगुती व व्यावसायिक वापरासाठी राखीव ठेवला, तर गॅसचा तुटवडा कायमचा संपू शकतो. याबाबत त्यांनी विधानसभा अध्यक्षांना आणि राज्य सरकारला निवेदन दिले आहे. ब्रिटीश पेट्रोलियमसोबतच्या कराराचा उल्लेख हर्षवर्धन जाधव म्हणाले की, उत्खननासाठी ब्रिटीश पेट्रोलियमसोबत झालेला करार हा केवळ विशिष्ट भागापुरता मर्यादित न ठेवता, संपूर्ण ऑईल फिल्डसाठी लागू करावा, जेणेकरून आपण केवळ स्वतःची गरज भागवून इतर देशांनाही गॅस पुरवू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात आणि राज्यात गॅसचा जो तुटवडा जाणवतो आहे तो दूर करण्यासाठी मी राज्य सरकारला निवेदन दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. महसूल वाढीसाठी भाडेतत्वावरील जमिनींचा मुद्दा हर्षवर्धन जाधव म्हणाले की, आपल्याकडे सर्व काही पुरेसे उपलब्ध आहे. त्यांचा उपयोग करण्याची गरज आहे. सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही यासंदर्भात महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला एक प्रस्ताव पाठवावा ज्यातून काहीतरी घडेल. इंधनासोबतच राज्याच्या तिजोरीतील भर टाकण्यासाठी जाधव यांनी एक महत्त्वपूर्ण सूचना केली आहे. शहरांमधील सरकारी जमिनींचे संपलेले भाडेकरार पुन्हा नूतनीकरण करून किंवा त्या जमिनी सील करून नवीन धोरण राबवल्यास मोठा आर्थिक स्रोत निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात न्यायालयाने सरकारला नोटीस बजावल्याची माहितीही त्यांनी दिली.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संवेदनशील विषयावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी संसदेत दिलेले उत्तर निव्वळ दिशाभूल करणारे असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. मंत्र्यांचे उत्तर 'थातूरमातूर' आणि वेळ मारून नेणारे आहे. ब्लॅकबॉक्स सुरक्षित असतानाही जळाल्याचे का सांगितले? असे म्हणत रोहित पवारांनी थेट मंत्र्यांच्या पारदर्शकतेवर आणि विमान कंपनीशी असलेल्या त्यांच्या संबंधांवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. अपघाताचा तपास आंतरराष्ट्रीय निकषांनुसार सुरू असल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना रोहित पवारांनी आरसा दाखवला आहे. त्यांनी विचारले की, जर बारामती विमान दुर्घटनेतील 'ब्लॅक बॉक्स' (Black Box) सुरक्षित आहे, तर मंत्र्यांनी तो जळाल्याचे का सांगितले? सत्य लपवण्यासाठी आणि पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी ही चुकीची माहिती दिली जात आहे का? ब्लॅक बॉक्समधील डेटा एडिट केला जात असल्याचा संशयही त्यांनी यापूर्वी व्यक्त केला होता. विमान कंपनीच्या मालकाकडे पाहुणचार रोहित पवार यांनी मंत्र्यांवर वैयक्तिक हितसंबंधांचे गंभीर आरोप केले आहेत. ज्या 'VSR Ventures' कंपनीचे विमान अपघातात सापडले, त्या कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात मंत्र्यांनी पाहुणचार घेतला होता, असा दावा त्यांनी केला. अशा परिस्थितीत मंत्री त्या 'मिठाला' जागून चौकशीत पारदर्शकता टाळत आहेत का? अशा मंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा कशी करायची? असा बोचरा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. अहमदाबाद अपघाताचा संदर्भ केवळ बारामतीच नव्हे, तर अहमदाबादमध्ये झालेल्या 'एअर इंडिया' विमान अपघाताच्या संदर्भातही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. अमेरिकन सुरक्षा एजन्सीने या अपघाताबाबत माहिती मागितली असतानाही ती का दिली जात नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. माहिती लपवून केंद्र सरकार नेमके काय साध्य करू पाहत आहे? असा आरोपही त्यांनी केला. संसदेत 'इंडिया' आघाडी आक्रमक होईल या प्रकरणात न्यायासाठी काँग्रेससह 'इंडिया' (INDIA) आघाडीतील सर्व मित्रपक्ष संसदेत आक्रमक भूमिका घेतील आणि हा विषय प्रभावीपणे मांडतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. विमान प्रवाशांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न असल्याने यात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री दिलेले उत्तर काय? खासदार मनोज झा यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री किजरापू राममोहन नायडू म्हणाले, मनोज झा यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मागील वर्षभरापासून या अपघातांविषयी लोकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होत आहेत. पण या प्रकरणात सर्वच तपास एएआयबीच्या माध्यमातून होतो. हा तपास आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयण संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने होतो. हा तपास कसा होणार? हे भारत ठरवत नाही. तो आंतरराष्ट्रीय मानकांनुसारच होतो. आपण त्याचे सदस्य होतो. आपल्याला त्याच्या नियम व अटी पालन कराव्याच लागतात. विमान अपघात जगात कुठेही झाला तरी हेच केले जाते.
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून जाणूनबुजून असे वक्तव्य केले जाते हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून अनावधानाने हे वक्तव्य गेले हे बिलकुल जाणवत नाही, मी सभागृहातच होतो. ते मुद्दाम अशी वक्तव्य करतात. त्यांना याची कठोर किंमत मोजावी लागणार आहे,असे मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. शंभुराज देसाई म्हणाले की, दिल्लीमध्ये जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू असते त्यावेळी शिवसेना खासदारांची बैठक घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये जात असतात. त्या बैठकीसाठी ते दिल्लीत गेले आहेत. राज्यातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते तिथे जात असतात. जिल्हा परिषद निवडीसंदर्भात दिल्लीला जाण्याची गरज नाही, तो राज्यातील प्रश्न आहे. केवळ खासदारांच्या बैठकीसाठी आणि राज्यातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत. आव्हाडांना वक्तव्याचे गांभीर्य नव्हते शंभुराज देसाई म्हणाले की, काल धर्मांतरविरोधी बिलावर सभागृहात चर्चा सुरू होती. यावर जितेंद्र आव्हाड बोलताना त्यांनी ऐतिहासिक संदर्भ देत असताना शिवरायांच्या राज्याभिषेकांच्या अनुषंगाने अपमानास्पद असे वक्तव्य केले. मी ते ऐकूण त्यावर हरकत घेतली, तालिका अध्यक्षांकडे मागणी केली की हे वक्तव्य काढून टाका, आव्हाडांना माफी मागायला लावा.पण आव्हाड काही माफी मागायला तयार नव्हते. सभागृह तहकूब झाले. अध्यक्षांनी आव्हाडांना 3 वेळा सांगितले की दिलगिरी व्यक्त करत शब्द मागे घ्या. अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा आव्हाड सभागृहात मोबाईलवर काही तरी बघत होते. कुणाशी तरी बोलत होते. इतकं अपमानास्पद वक्तव्य करुणही त्यांना त्यांचे काहीच गांभीर्य नव्हते. आव्हाडांना निलंबित करायला हवे होते शंभुराज देसाई म्हणाले की, आपल्याकडून जर एखादे वक्तव्य चुकीने गेले असेल तर चेहऱ्यावरील हावभावावरुन ते लक्षात येते. पण जितेंद्र आव्हाडांच्या चेहऱ्यावर ते वक्तव्य चुकीने गेले असे काहीच हावभाव नव्हते. शेवटी अध्यक्षांनी निर्देश दिले की माफी मागावी. निर्देश दिल्यावरसुद्धा त्यांनी केवळ त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. अध्यक्षांनी कारवाई करू अशी कडक भूमिका घेऊ म्हटल्यावर त्यांनी ते शब्द माघारी घेतले. त्यांना निलंबित करावे अशी आम्हा सर्वांची इच्छा होती. पण अध्यक्षांनी त्यांना अखेरची समज दिली. महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल शंभुराज देसाई म्हणाले की, महायुतीच्या समन्वय समितीची बैठक अजून झालेली नाही. राज्यभरात ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक लढवली गेली नाही त्या ठिकाणांचा रिपोर्ट एकनाथ शिंदेंना देण्यात आलेला आहे. उदय सामंत, मी, बावनकुळे, तटकरे, मुश्रीफ या समितीमध्ये आहे. मित्रपक्षांबद्दल समन्वय समितीमध्ये चर्चा करू.
मुंबईतील बोरीवली परिसरात भाजपच्या एका नगरसेविकेची 'दबंगगिरी' समोर आली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वॉर्ड क्रमांक १५ च्या भाजप नगरसेविका जिज्ञासा निकुंज शाह यांनी एका खासगी दुकानात बेकायदेशीरपणे घुसून तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दुकानातील मंदिरात चपलांसह प्रवेश करून त्यांनी 'सनातन धर्माचा' अवमान केल्याचा दावा करत स्थानिक भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानाच्या मालमत्तेचे पूर्ण कायदेशीर हक्क पीडिताकडे असतानाही वॉर्ड क्रमांक 15 च्या भाजप नगरसेविका जिज्ञासा निकुंज शाह यांनी तेथे सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या वादात हस्तक्षेप करण्यास नकार दिला असतानाही, नगरसेविकेने कोणाचीही पर्वा न करता दुकानातील सामान रस्त्यावर फेकून दिले. या बेकायदेशीर तोडफोडीमुळे दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चपलांसह मंदिरात प्रवेश केल्याने संताप तोडफोडीच्या दरम्यान नगरसेविका जिज्ञासा शाह यांनी दुकानात असलेल्या छोट्या मंदिरात चपला घालून प्रवेश केला. या कृत्यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत स्थानिकांनी भाजप नगरसेविकेचा निषेध केला आहे. सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण करण्याऐवजी लोकप्रतिनिधीच अशी मुजोरी करत असतील, तर दाद कोणाकडे मागायची? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. भाजप नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष या गंभीर घटनेनंतरही स्थानिक भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी नगरसेविकेवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेतृत्व अशा प्रकारच्या 'गुंडगिरी'ला पाठबळ देत आहे का, अशी बोचरी टीका आता विरोधकांकडून आणि सामान्य जनतेतून होत आहे. लोकप्रतिनिधीने कायद्याचे उल्लंघन करून खासगी मालमत्तेचे नुकसान केल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हे ही वाचा… कौटुंबिक वादातून पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले:मुलुंड स्थानकावरील घटना, पतीला अटक; हत्येपूर्वी पत्नीची पोलिसांत तक्रार मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकावर काळजाचा ठोका चुकवणारी एक भीषण घटना उघडकीस आली आहे. सततच्या कौटुंबिक वादातून एका नराधम पतीने आपल्या ३६ वर्षीय पत्नीला चक्क धावत्या लोकलसमोर ढकलून देऊन तिची हत्या केली. ही संपूर्ण घटना स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, घटनेनंतर मुलासह फरार झालेल्या राजुकुमार गुप्ता याला रेल्वे पोलिसांनी सुरतमधून अटक केली आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या काही तास आधीच मृत महिलेने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचा…
पिंपरी-चिंचवडमध्ये अमली पदार्थांचे मिश्रण तयार करून त्याची विक्री करणाऱ्या एका युनिटवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जांबेगाव येथील 'चैतन्य फूड गोदाम' येथे टाकलेल्या छाप्यात पती-पत्नीला अटक करण्यात आली असून, 6 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कैलास दत्तात्रय मांढरे (वय 54) आणि अनुराधा कैलास मांढरे (वय 54, दोघे रा. माळसाकांत चौक, आकुर्डी, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी अमली पदार्थांचे मिश्रण तयार करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान, कैलास मांढरे हा अमली पदार्थ मिश्रित पावडर तयार करून पान आणि गुटखाजन्य पदार्थांमध्ये मिसळून विकत असल्याची खात्रीशीर माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून 'चैतन्य फूड गोदाम' येथे छापा टाकला. छाप्यादरम्यान, आरोपी अमली पदार्थांचे मिश्रण तयार करताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून अमली पदार्थ मिश्रित पावडर, द्रव स्वरूपातील अमली पदार्थ, तीन मोबाईल फोन, एक चारचाकी वाहन, तसेच विविध मशीन आणि साहित्य असा एकूण 6 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 17(ब), 22(ब) आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पहिल्यांदाच एका कंपनीने विकसित केलेल्या 'ड्रग ॲनालाईझर किट'चा वापर करण्यात आला. या किटच्या मदतीने तपासणी केली असता, जप्त केलेल्या पदार्थांमध्ये अफिमसारख्या अमली पदार्थाचा अंश असल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथक-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नाईक, तसेच पथकातील इतर अधिकारी व अंमलदार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
नमस्कार!विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आपण पाहत आहात आमचे विशेष लाईव्ह अपडेट्स. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील आजच्या कामकाजात विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याचीही चिन्हे दिसत आहेत. सभागृहात नेमके काय घडत आहे? कोणते निर्णय घेतले जात आहेत? आणि त्याचा जनतेवर काय परिणाम होणार? याची प्रत्येक ताजी माहिती आम्ही तुम्हाला थेट पोहोचवत आहोत. चला, पाहूया विधिमंडळातील आजच्या घडामोडी…
सेनगाव तालुक्यातील गूुगुळपिंपरी शिवारात गोरेगाव पोलिसांच्या पथकाने एका शेतात छापा टाकून कांद्याच्या पिकात लावलेली गांजाची 80 झाडे जप्त केली आहे. या गांजाची किंमत सुमारे 85 ते 90 हजार रुपये आहे. या प्रकरणी एका शेतकऱ्या विरुध्द गोरेगाव पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 16 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांत अवैध व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कारवाईची मोहिम सुरु आहे. पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा तसेच 13 पोलिस ठाण्यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकाकडून अवैध व्यवसायाविरुध्द कारवाई केली जात आहे. दरम्यान सेनगाव तालुक्यातील गुगुळपिंपरी शिवारात एका शेतकऱ्याच्या शे्तात कांद्याच्या पिकात गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, जमादार अनिल भआरती, राहुल मैंदकर, नवले यांच्यासह पोलिसांच्या पथकाने सोमवारी दुपारपासूनच शोध मोहिम हाती घेतली होती. तब्बल तीन तासानंतर पोलिसांनी गुगुळपिंपरी शिवार फिरल्यानंतर विठ्ठळ ढोक याच्या शेतात गांजाची झाडे लावल्याचे दिसून आले. पोलिसांच्या पथकाने पाहणी केली असता काही झआडे तीन ते चार फुट तर काही झाडे दोन फुटापर्यंत वाढली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 80 झाडे जप्त केली आहेत. या झाडांचे वजन साडेआठ किलो भरले असून त्याची किंमत 85 ते 90 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी उपनिरीक्षक नितीन लेनगुळे यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी विठ्ठल ढोक (रा. माहेरखेडा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. उपाधिक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक झळके, उपनिरीक्षक लेनगुळे पुढील तपास करीत आहेत.
शहरात पीएनजी (पाईप्ड् नॅचरल गॅस) ग्राहकांची संख्या वाढत असतानाच, आता सायबर भामट्यांनी आपला मोर्चा एमएनजीएल ग्राहकांकडे वळवला आहे. अधिकृत वाटावा असा लोगो आणि नाव वापरून ग्राहकांना बनावट बिले अन् घातक एपीके फाईल्स पाठवल्या जात आहेत. या लिंकवर क्लिक करताच ग्राहकांची बँक खाती रिकामी केली जात असल्याने गॅस ग्राहकच गॅसवर असल्याचे चित्र आहे. गेल्या 15 दिवसात अशा 15 हून अधिक घटना समोर आल्या असून, यात लिंकला प्रतिसाद देणाऱ्या चार ग्राहकांच्या बँक खात्यातू 10 लाखांहून अधिकची रक्कम लंपास झाल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारांवर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझोत... शहरात गेल्या तीन वर्षांपासून घरगुती गॅस लाईनद्वारे पुरवठा करण्यासाठी काम सुरू आहे. अनेक ठिकाणी जोडण्या केल्या गेल्या आहेत. तर काही ठिकाणी कामे सुरू आहेत. मात्र, ज्या नागरिकांनी एमएनजीएल कंपनीकडे नोंद केली आहे. त्यांचा तपशील सायबर भामट्यांकडून चोरला गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात पाईपद्वारे गॅस पुरवठादार एमएनजीएल कंपनीच्या ग्राहकांना पहिले बिल हाती येण्यापूर्वीच सायबर भामट्यांचे फ्रॉड कॉल येत आहेत. यात ग्राहकांना त्यांच्या व्हॉट्सॲपवर एपीके स्वरूपातील एक फाईल पाठवली जाते. ती डाउनलोड करण्यास सांगितले जात आहे. मात्र, असे करताच मोबाईल स्क्रीन क्लोनिंग करून सायबर भामटे संबंधित ग्राहकाच्या बँक खात्यावरील रक्कम गायब करत असल्याचे प्रकार वाढले आहेत. थकबाकी भरण्यासाठी दबाव टाकणे, फोनवर अरेरावी करणे आणि गॅस कनेक्शन कापण्याची भीती दाखवणे अशा नवीन फंड्यामुळे नाशिककर ग्राहक सध्या प्रचंड तणावाखाली आहेत. “डिजिटल गॅस बिला’च्या नावाखाली होणारी ही लूट थांबवण्यासाठी आता प्रशासकीय सतर्कतेची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 8583084688 क्रमांकावरून फोन, पण सतर्कतेमुळे वाचले एमएनजीएलमधून बोलत असल्याचा 8583084688 क्रमांकावरून एका ज्येष्ठ नागरिकाला फोन आला. बिलाच्या रकमेची मागणी करण्यात आली. मात्र, हा फसवा कॉल असल्याचे ओळखून ज्येष्ठाने तोकट केला. तत्काळ एमएनजीएलच्या कस्टमर केअरला कॉल करून विचारणा केली, तेव्हा संबंधित क्रमांक फ्रॉड असल्याचे सांगण्यात आले. सतर्कतेमुळे फसवणूक टळली. एपीके फाईल डाउनलोड केली अन् दोन तासांत 50 हजार गेले एमएनजीएल कंपनीच्या नावाने सिडकोतील एका महिला गॅस ग्राहकाला फोन आला. समोरील व्यक्तीने तुमच्या गॅस कनेक्शनसंदर्भातील प्रक्रियेसाठी एक ॲप पाठवले असून, ते डाउनलोड करण्यास सांगितले. ही फाईल डाउनलोड करून माहिती भरली. मात्र, यानंतर दोन तासांत टप्प्याटप्प्याने करत 50 हजार रुपये काढून घेण्यात आले. सेवानिवृत्त अधिकाऱ्याला 6 लाख 70 हजारांचा गंडा शहरातील एका सेवानिवृत्त अधिकारी यांना एमएनजीएल गॅस कनेक्शनचे बिल भरण्याबाबत मेसेज आला. बिल भरले नाही तर कनेक्शन कट केले जाईल, असे सांगत बिल भरण्यासाठी लिंक पाठवली गेली. ग्राहकाने लिंक अोपन केल्यानंतर बँक खाते हॅक करण्यात येऊन 6 लाख 70 हजारांची रक्कम खात्यातून ऑनलाईन काढून घेण्यात आली. तेजस मोयल, सायबरतज्ज्ञ, नाशिक अशी केली जातेय फसवणूक सायबर भामट्यांकडून व्हॉट्सॲपवर एमएनजीएलच्या गॅस कनेक्शनसंदर्भात एक संदेश पाठवला जात आहे. या मेसेजच्या माध्यमातून ग्राहकांची माहिती भरून घेतली जाते आणि त्यानंतर या मेसेजच्या माध्यमातून ग्राहकांच्या मोबाइलचा ताबा सायबर भामटे घेत आहेत. ‘एपीके’ फाईल डाउनलोड करू नका.. सायबर गुन्हेगारांकडे एमएनजीएल कंपनीच्या ग्राहकांचा मोबाइल/ व्हॉट्सॲप क्रमांक, पूर्ण नाव, पत्ता, बिलाची रक्कम अशी सर्व माहिती असल्याचे आजवर घडलेल्या गुन्हेगारी घटनांवरून दिसून येत आहे. ही माहिती चोरट्यांपर्यंत पोहोचली कशी, याबाबत नागरिकांसह सायबर पोलिसही आवाक् असून, एमएनजीएल कंपनीकडील संपूर्ण डाटा लीक अथवा चोरला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सायबर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नसल्याने ग्राहकांच्या फसवणुकीच्या घटना शहरात कमालीच्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांनी खबरदारी घेणे हाच पर्याय ग्राहकांनी कुठल्याही अनोळखी कॉलला प्रतिसाद देऊ नये. व्हॉट्सॲप किंवा एमएमएसद्वारे आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. ही फसवणूक एपीके फाईलद्वारे होत असल्याने अशा फाईल डाउनलोड करू नये. फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सतर्क रहावे. - संजय पिसे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस अँड्रॉइड पॅकेज फिट म्हणजे एपीके. हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल करण्यासाठीची फाईल असते. ही फाईल हानिकारक नसली, तरी त्याचा स्त्रोत मात्र अत्यंत धोकादायक असतो. प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरवर खात्रीशीर ॲप असतात. मात्र, थेट लिंक, टेलिग्राम, व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेल्या अशा एपीके फॉरमॅटमधील फाईल असुरक्षित असतात. एपीके ॲपवर क्लिक करताच ॲप इन्स्टॉल होते. जे ॲप लिस्टमध्ये दिसत नाही. मोबाईलधारकाला अज्ञात स्त्रोतांकडून (फ्लॅश मेसेज) विविध मेसेज सुरू होतात. हे ॲप कॅमेरा, मायक्रोफोन, लोकेशन, कॉन्टॅक्स, एसएमएस, गॅलरीची परवानगी मागते. तुमचे सर्व मेसेज एका विशिष्ट नंबरला ऑटो फॉरवर्ड होतात. अशा फाईल काही केबी (केबी) साईजच्या असतात.
नारेगावातील विवाहितेचा बळजबरीने गर्भपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात माहेरच्या मंडळींनी पोलिसांना फोन केल्यावर पथक तत्काळ त्या ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत सर्व आरोपी पळून गेले असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल तीनगोटे ही त्याच घरात लपून होती. सर्व पथक माघारी गेल्यावर ती मागच्या दाराने पळून गेली. तिचा अद्यापही पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, यात शनिवारी अटक केलेला आरोपी शंकर आढावे याला न्यायालयाने 18 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती तपास अधिकारी एपीआय कैलास लहाने यांनी दिली. यापूर्वी या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिसांनी पती अरबाज सय्यद, सासू आसिया आणि सासरा फेरोज सय्यद या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यातील मनपाचा कंत्राटी कर्मचारी शंकरवर संशयाची सुई होती. पोलिस पथकाची कसलीही भीती न बाळगता तो दुसऱ्या दिवशी कामावर हजर झाला. मनपाच्या आरोग्य विभागाने संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यावर त्यांनाही या कटात शंकरचा सहभाग असल्याचे दिसून आले होते. त्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क करून तो कामावर हजर झाल्याची माहिती दिल्यावर पथकाने त्यास बेड्या ठोकल्या तर कुख्यात आरोपी सतीश सोनवणेचा शोध सुरू आहे. संघटित गुन्हेगारी असल्याने मकोका कलम आवश्यक संबंधित गुन्ह्याचे स्वरूप पाहता हे कृत्य टोळीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे स्पष्ट होते. संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी केवळ सामान्य कलमे पुरेशी नाहीत. अशा प्रकरणांत गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना सहजासहजी जामीन मिळणार नाही. समाजात जरब बसेल.
छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषदेच्या युतीबाबत अडीच वर्षांच्या फॉर्म्युलामध्ये अध्यक्षपद कुणाला द्यायचे, याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि उद्धवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य सहलीवर पाठवण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत अजूनही शिवसेना आणि भाजपची एकत्रित बैठक झालेली नाही. मात्र, कुठलीही गडबड होऊ नये यासाठी पूर्ण नियोजन दोन्ही पक्षांनी केले आहे. गेल्या वेळी तीन पंचायत समिती सदस्य फुटल्यामुळे उद्धवसेनेने चार दिवसांपासून सदस्य सहलीवर पाठवले आहेत. बुधवार (दि.18) रोजी विशेष सभा होईल. छत्रपती संभाजीनगरमधील निवडणूक चुरशीची ठरू लागली आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने बहुमत नसतानाही छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड पंचायत समितीमध्ये बाजी पलटवली होती. त्यामुळे शिवसेनेकडूनही ऐनवेळी दगाफटका होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. दरम्यान, याबाबत अतुल सावे यांनी सांगितले की अध्यक्ष महायुतीचाच होणार आहे. सुरुवातीची अडीच वर्षे कोण घेणार, याचा निर्णय बाकी आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे. चार दिवसांपूर्वीच सदस्य बाहेर उद्धवसेनेच्या सदस्यांना पंचायत समितीत मोठी नामुष्की आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा सदस्य फोडू नयेत, यासाठी चार दिवसांपूर्वीच आम्ही सदस्य सहलीवर पाठवले आहेत. आमचा युतीचा पर्याय खुला असल्याची माहिती शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांचा निर्णय मुंबईतच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांचा निर्णय मुंबईतच होणार आहे. त्यामुळे भाजपचे निवडून आलेले 23, एक अपक्ष, तसेच काँग्रेसमधून प्रवेश केलेला एक सदस्य असे 25 जण मुंबईत सहलीवर आहेत. पक्षाकडून दिलेल्या निर्देशांचे पालन करत असल्याचे भाजपकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर नाव असलेल्या सदस्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. प्रक्रिया पारदर्शक; ट्रायल घेतली बुधवारी (दि.18) होणाऱ्या सभेला अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे पीठासीन अधिकारी असतील. सकाळी 10 ते 12 नामनिर्देशन, दुपारी 2 ला सभा. छाननीनंतर माघारीची संधी, हातवोटिंगने निर्णय व्हिडिओ रेकॉर्डिंगसह. पंचायत समिती सभापती हजर राहणार, पण मतदान नाही. सोमवारी याची ट्रायल झाली. शिवसेनेची सावध भूमिका गतवेळी पंचायत समितीमध्ये शिवसेनेच्या सदस्यांची मते फुटली. त्यामुळे आता ही मते फुटू नयेत यासाठी शिवसेनेच्या सदस्यांना सहलीसाठी मुंबईत पाठवले. सध्या शिवसेनेकडून 21 निवडून आलेले सदस्य आहेत. इतर अपक्षांपैकी तीन सदस्य शिंदेसेनेकडे आल्याचा दावा शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या चार सदस्यांची भूमिकादेखील निर्णायक राष्ट्रवादीच्या 4 सदस्यांची भूमिकादेखील निर्णायक ठरणार असून याबाबत राष्ट्रवादीचे जि.प. सदस्य पंकज ठोंबरे म्हणाले की, जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण जे सांगतील तो आमचा निर्णय असेल. राष्ट्रवादी (शप) चे सदस्य वरुण पाथ्रीकर म्हणाले की, पक्षाचा जो निर्णय असेल त्यानुसार निर्णय घेणार आहेत. भाजपचे 25, शिंदेसेनेनेही अपक्षांना घेऊन जमवले 25, त्यामुळेच पेच भाजप (23) व शिवसेना (21) यांच्यात पहिल्या टर्मवरून स्पर्धा सुरू असून उबाठा (9), अजित पवार राकॉ (4) यांची भूमिका महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबईकडून युतीसाठी प्रयत्न, पण भाजप अपक्ष घेऊन दबाव टाकतोय. संख्याबळावर शिवसेनेला कमी महत्त्वाची पदे मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकावर काळजाचा ठोका चुकवणारी एक भीषण घटना उघडकीस आली आहे. सततच्या कौटुंबिक वादातून एका नराधम पतीने आपल्या ३६ वर्षीय पत्नीला चक्क धावत्या लोकलसमोर ढकलून देऊन तिची हत्या केली. ही संपूर्ण घटना स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, घटनेनंतर मुलासह फरार झालेल्या राजुकुमार गुप्ता याला रेल्वे पोलिसांनी सुरतमधून अटक केली आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या काही तास आधीच मृत महिलेने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, मृत ३६ वर्षीय पुष्पा आणि तिचा पती राजुकुमार यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक कलह सुरू होता. सततच्या भांडणांना कंटाळून पुष्पाचा भारतीय सैन्यात जवान असणारा भाऊ कमलेश कुमार गुप्ता हा आपल्या बहिणीला आणि तिच्या १५ वर्षांच्या मुलाला उत्तर प्रदेशातील मूळ गावी घेऊन जाण्यासाठी मुंबईत आला होता. १४ मार्च रोजी सकाळी पुन्हा एकदा पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून संतापलेल्या राजुकुमारने क्रूर कट रचला. चतुराईने पत्नीच्या भावाला घरात कोंडले पुष्पा, तिचा भाऊ कमलेश आणि मुलगा मुलुंड स्थानकावर जाण्यासाठी निघाले होते. मात्र, वाटेत कमलेशला आपले लष्करी ओळखपत्र (ID Card) घरीच विसरल्याचे लक्षात आले. तो आणि त्याचा पुतण्या ओळखपत्र आणण्यासाठी घरी परतले असता, राजकुमार त्यांच्या पाठोपाठ गेला. राजुकुमारने दोघांनाही बाहेरून कडी लावून घरात कोंडून ठेवले. यानंतर त्याने थेट मुलुंड स्थानक गाठले, जिथे पुष्पा एकटीच त्यांची वाट पाहत उभी होती. लोकलसमोर ढकलून केला खून स्थानकावर पोहोचताच राजुकुमार आणि पुष्पा यांच्या पुन्हा काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर राजुकुमारने प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर लोकल जवळ येताच मागून जोराचा धक्का देऊन पुष्पाला रुळावर ढकलले. या अपघातात पुष्पा यांचा जागीच मृत्यू झाला. या क्रूर कृत्यानंतर आरोपीने आपल्या लहान मुलाला सोबत घेतले आणि मुंबईतून पळ काढला. दरम्यान, घरात कोंडलेल्या कमलेशने शेजाऱ्यांच्या मदतीने आपली सुटका करून घेतली आणि स्थानकावर धाव घेतली, मात्र तोपर्यंत सर्व संपले होते. सीसीटीव्ही आणि पोलिसांची कारवाई रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व धक्कादायक प्रकार कैद झाला आहे. कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी सुरतमध्ये असल्याचे निष्पन्न झाले, जिथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. राजुकुमार गुप्ता याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा धुराळा उडत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली दौऱ्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आज (मंगळवार, दि. १७) ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार असून, या दौऱ्यात आगामी निवडणुकांचे जागावाटप आणि महायुतीमधील समन्वयावर निर्णायक चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही निवडणुकांमध्ये मित्रपक्षांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याचा 'अंतर्गत अहवाल' घेऊनच शिंदे दिल्लीत दाखल झाल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेने एक गोपनीय अहवाल तयार केला आहे. मागील तीन निवडणुकांमध्ये काही विशिष्ट मतदारसंघांमध्ये मित्रपक्षांच्या असहकार्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, असा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. आगामी निवडणुकांमध्ये अशा चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि समन्वय अधिक घट्ट करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा अहवाल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडून आपली भूमिका आक्रमकपणे मांडू शकतात. दिल्लीत खासदारांची घेतली भेट दिल्लीत आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची तातडीची बैठक घेतली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पक्षाची भूमिका काय असावी, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. विरोधकांकडून केंद्र सरकारविरोधात पसरवल्या जाणाऱ्या 'फेक नॅरेटिव्ह'चा पर्दाफाश करण्यासाठी खासदारांनी आक्रमक व्हावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली आर्थिक आव्हाने आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय यावर केंद्र सरकारच्या उपाययोजनांना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. 'पक्ष नाव व चिन्हा'बाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा एकनाथ शिंदे हे राजकीय चर्चांसोबतच सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या न्यायालयीन लढाईबाबतही शिंदे कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत. या कायदेशीर लढाईत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी ते स्वतः वकिलांच्या भेटी घेऊन आढावा घेत आहेत. उद्या देवेंद्र फडणवीसही दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उद्या (बुधवारी) दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या 'केंद्रीय संचलन समिती'ची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत तिकीट वाटप आणि निवडणूक रणनीतीवर खलबतं होणार असून, महाराष्ट्रातील दोन्ही बड्या नेत्यांच्या दिल्ली भेटींमुळे महायुतीच्या आगामी वाटचालीचे चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. हे ही वाचा… शिखर बँक घोटाळा प्रकरणाची फाईल बंद:विशेष न्यायालयाने 'क्लोजर रिपोर्ट' स्वीकारला, अजित पवारांसह 70 जणांना क्लीन चिट गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी पवार कुटुंबाला मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यासह ७० हून अधिक माजी संचालकांना या प्रकरणात विशेष न्यायालयाने पूर्णतः 'क्लीनचीट' दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सादर केलेला 'सी-समरी' (Closer Report) न्यायालयाने अधिकृतपणे मंजूर केल्याने आता हे प्रकरण कायमचे बंद झाले आहे. सविस्तर वाचा…
उन्हाळ्यामधे तहानलेल्यांना पाणी पाजण्यासाठी लागणाऱ्या पाणपोइंची (पाणेरी) संख्या यावर्षी घटली आहे. त्यामुळे पाण्याचा धर्म आटला की काय, असे चित्र सध्या अकोट शहरात दिसून येत आहे. वऱ्हाडात उन्हाचा कडाका दरवर्षीच असतो. दरवर्षी गुढीपाडवा झाल्यावर उन्हाची तीव्रता वाढते. या उन्हाळ्यामधे वाटसरूंसाठी मोफत पेयजल उपलब्ध करुन देण्याची अकोटवासियांची परंपरा आहे. जवाहर मार्ग बसस्थानक मार्ग, नरसिंग रोड, गोलबाजार, अंजनगाव रोड आदी मार्गावर पाणपोया लागतात. काही दानशूर मंडळी स्वखर्चाने पाणपोया लावतात. काही समाजबांधव वर्गणी गोळा करुन पाणपोई लावतात. दिवंगत नातेवाइकांच्या स्मरणार्थ सुद्धा पाणपोई लावतात. परंतु यावर्षी उन्हामुळे पारा ४० पेक्षा जास्त असला तरीही पाणपोईची संख्या वाढली नाही. पाणपोई लागल्यास बाहेर गावांहून अकोटात विविध कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांना सोईचे होते. अकोला जिल्ह्यातील दोन अग्रणी सहकारी बँक पाणपोई लावत होत्या. स्थानिक व्यवस्थापन मंडळाचे पदाधिकारी या पाणपोयांचे उद्घाटन करत होते. परंतु आता या पाणपोई बंद झाल्या आहेत. या पाणपोइंमुळे नागरिकांची सोय होत होती. अकोटला जोडून अनेक खेडी आहेत. ही खेडी वैद्यकीय कारणांसाठी व विविध सामानाच्या खरेदीसाठी अकोटवर अवलंबून आहेत. या खेडेगावांतील नागरिक विविध कामासाठी अकोटला येतात. त्यांना पेयजलाचे गरज असते. सर्वच जण पाणी विकत घेऊन पिऊ शकत नाहीत. त्यांना पाणेरीचा आधार होता. परंतु पाणपोई कमी झाल्याने नागरिकांना फटका बसत आहे. पाणेरीचालक हे गुराढोरांनाही पाणी पाजत होते. गेल्या वर्षी एका व्यावसायिकाने आरओ थंड पाण्याच्या कॅनची पाणपोई लावली होती. दररोज सुमारे ४० ते ५० कॅन पाणी तहानलेले पित होते. गतवर्षी या उपक्रमाला व्यापक प्रसिद्धी मिळाली होती. व्यावसायिकाने स्वखर्चाने तो उपक्रम राबवला होता. परंतु यंदा तो बंद पडला आहे. भरपूर पाणी प्या, उष्माघात टाळा : डॉ. व्यवहारे उन्हाचा कडाका पाहता शरीराचे तापमान कायम ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या व उष्माघात टाळा. घराबाहेर निघताना डोक्यावर टोपी किंवा दुपट्टा बांधा. शक्य झाल्यास दुपारच्या सुमारास घराबाहेर पडू नका. तसेच उन्हात काळे कपडे घालू नका. भरपूर पाणी प्या व उष्माघात टाळा,असा सल्ला डॉ. सूरज व्यवहारे यांनी दिला. सामाजिक संघटना निष्क्रिय देशभरातील कोणत्याही घटनेला पाठिंबा किंवा निषेध करणाऱ्या संघटनांना पाणपोया लावाव्यात असे वाटले नाही. त्यांचे पत्रकबाज नेते सुध्दा पाणपोया लावण्यासाठी पुढे आले नाहीत. निषेध करणारे, अभिनंदन करणारे पत्रकबाज नेते उन्हाळ्यात दिसेनासे झाले आहेत.
इंधनाचा पुरेशा साठ्यानंतरही सोमवारी सकाळी काही पेट्रोल पंपावर दुचाकीस्वारांची रांग दिसून आली. समाजमाध्यमांवरील अफवांमुळे अनेक दुचाकीस्वारांनी पेट्रोलपंपावर धाव घेतली. पेट्रोलचे टँकर रात्रीऐवजी सकाळी आल्याने काही वेळ पंप बंद होते. टँकरमधील इंधन पंपामध्ये टाकल्यानंतर पेट्रोल विक्री सुरळीत झाली. पेट्रोलपंप चालक व प्रशासनाकडूनही इंधनाचा तुटवडा नसल्याचेही स्पष्ट केले. जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कंपन्यांचे डेपो आहेत. सोमवारी सकाळी काही पेट्रोल पंप बंद होते. मात्र नागरिकांनी घाबरून अन्य पंपावर गर्दी केली. मात्र नंतर गर्दी कमी झाली. डिलर्स : अकोला पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल राठी यांनी इंधनाचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुरेशा पुरवठ्याबाबत डिलर्स संबंधित कंपन्यांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. असा घडला प्रकार सकाळी जुने शहरात पेट्रोल मिळत नसल्याचे काहींनी राजकीय नेत्यांना फोन केले. काही वेळाने भाजपशी निगडीत एका गृपवरुन लोकप्रतिनिधींनी इंधन कंपनीचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून पेट्रोलची टंचाई होणार नाही, दक्षता घेण्याचे आदेश दिल्याची पोस्ट टाकण्यात आली. काही वेळाने पेट्रोल विक्री सुरु झाली. अशी आहे संख्या-विक्री शहरात सुमारे ७० पेट्रोल पंप आहेत. रोज ४ ते १० हजार लिटर पेट्रोल-डिझेलची सरासरी विक्री होते. राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरही पेट्रोल पंप आहेत. शहराला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारे रस्तेही रुंद आहेत. पेट्रोल व डिझेलचा शहरासह महामार्गांवरील पंपांवरही पुरेसा साठा आहे. त्यामुळे इंधनाचा तुटवडा नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अनेकांनी तपासली गाडीची पेट्रोल टँक जुने शहरात सकाळी पेट्रोलपंपावर दुचाकीस्वारांची गर्दी झाली. कार्यालयात निघालेले दोन जण गर्दी पाहून थांबले. त्यांनीही स्वत:च्या दुचाकी टँकमध्ये पेट्रोल आहे की नाही, किती आहे, हे तपासले. एकाच्या दुचाकीची टँक पेट्रोलने भरलेली होती. मात्र तोही संध्याकाळी जेवढे भरले तेवढे पेट्रोल भरुन घेतो, असे म्हणत गेला.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी पवार कुटुंबाला मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यासह ७० हून अधिक माजी संचालकांना या प्रकरणात विशेष न्यायालयाने पूर्णतः 'क्लीनचीट' दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सादर केलेला 'सी-समरी' (Closer Report) न्यायालयाने अधिकृतपणे मंजूर केल्याने आता हे प्रकरण कायमचे बंद झाले आहे. २०११-१२ च्या सुमारास शिखर बँकेने राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांना नियमबाह्य कर्जवाटप केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता. हे कारखाने डबघाईला आल्यानंतर ते कवडीमोल किमतीत विकले गेले आणि त्यामुळे बँकेचे सुमारे २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, प्रदीर्घ तपासानंतर आता न्यायालयाने हा विषय निकाली काढला आहे. नेमका निकाल काय? मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचे सांगत दुसऱ्यांदा 'सी-समरी' अहवाल न्यायालयात सादर केला होता. त्यावर सुनावणी करताना विशेष न्यायालयाने मोठे निरीक्षण नोंदवले. संबंधित संचालकांच्या कृतीमध्ये कोणतीही बेईमानी, लबाडी किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा हेतू दिसून येत नाही. तसेच, संचालकांमध्ये कोणत्याही बेकायदेशीर कृत्यासाठी पूर्वनियोजित कट किंवा संगनमत झाल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणेला सापडलेले नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. क्लोजर रिपोर्टला आव्हान देणाऱ्या याचिकाही फेटाळल्या या क्लोजर रिपोर्टला आव्हान देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व अन्य याचिकाकर्त्यांच्या निषेध याचिका देखील न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रदीर्घ काळ राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलेल्या या हजारो कोटींच्या कथित घोटाळ्याच्या कायदेशीर प्रक्रियेवर आता पडदा पडला आहे. राजकीय वळण आणि ई़डी चौकशीवर परिणाम या निर्णयामुळे पवार कुटुंबावरील राजकीय आरोपांची धूळ आता खाली बसली आहे. विशेष न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेचा अहवाल स्वीकारल्यामुळे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चौकशीतही आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता कायदेशीर तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. फौजदारी गुन्हाच सिद्ध न झाल्याने ईडीच्या तपासाचा आधारही कमकुवत होणार असल्याचे बोलले जात आहे.
पुण्यात नोकरी करणाऱ्या २४ वर्षीय इंजिनिअर मुलीला ट्रॅव्हल्स पॉइंटवर सोडून देण्यासाठी जाताना वडिलांच्या दुचाकीला मद्यधुंद सुसाट कार चालकाने धडक दिली. त्यात इंजिनिअर मुलीसह, तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. तर २२ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात रविवारी १५ मार्चला रात्री बारा वाजताच्या सुमारास अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेवर झाला. धडक देणाऱ्या कारचा चालक दारु पिलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. गजानन श्रीरामजी माकोडे (५२), सपना गजाननराव माकोडे (२४, रा. प्रकाश कॉलनी, मायानगर.) असे मृतक वडील व मुलीचे नाव आहे. प्रियंका गजाननराव माकोडे (२२) असे जखमी मुलीचे नाव आहे. गजानन वाकोडे यांची मोठी मुलगी सपना ही इंजिनीअर असून, पुण्यात नोकरी करत होती. ती शहरात आली होती. सोमवारी १६ मार्चला कामावर रुजू होण्यासाठी ती रविवारी रात्री १२. १० वाजताच्या खासगी बसने पुण्याला जाणार होती. सपनाला ट्रॅव्हल्स पॉइंटवर सोडून देण्यासाठीच तिचे वडील गजाननराव हे मुलगी प्रियंकासह दुचाकीने तिघे जात होते. अमरावती ते बडनेरा एक्स्प्रेस हायवेवरील एमआयडीसी परिसरात खासगी बस थांबते. तिथे सपनाला सोडायचे होते. एमआयडीसीतील त्याच क्रॉसिंगवर गजाननराव दुचाकीने रस्ता क्रॉस करत होते, त्याचवेळी अमरावतीकडून बडनेराच्या दिशेने जाणाऱ्या एक्ययुव्ही ७०० या कारच्या दारुड्या चालकाने गजाननराव मोकोडे यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती. दुचाकीचा चेंदामेंदा झाला, सोबतच गजाननराव, सपना व प्रियंका तिघेही रस्त्यावर रक्तबंबाळ होवून गंभीर जखमी झाले. यामध्ये सपना व गजानन यांच्या पायाला व डोक्याला जबर दुखापत झाली. तिघांनाही नातेवाईक व पोलिसांनी इर्वीन रुग्णालयात आणले, उर्वरित. पान ४ अपघातात कारची गती जास्त होती. दुचाकीला धडकताच गजानन वाकोडे यांचा पाय शरीरापासून वेगळा झाला. तो पोलिसांनी नेला होता. कारच्या बोनेट मधील सुटे भाग चेपले. माकोडेंची दुचाकी चेंदामेंदा झाली दुचाकीच्या पेट्रोल टँकसह इतर भाग तुटले. कारच्या दोन एअर बॅग उघडल्या, यावरुन धडक दिली त्यावेळी कारची गती ताशी ११० ते १२० च्या असावी, अशी चर्चा होती. वाकोडे यांच्या कुटुंबांत गजानन, त्यांची पत्नी, तीन मुली व एक मुलगा असे सदस्य आहेत. दरम्यान एकाचवेळी गजाननराव व त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी एकाचवेळी त्यांच्या मायानगर परिसरातील घरुन वडील व मुलीची अंत्ययात्रा एकाचवेळी निघाल्या, तसेच त्यांच्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने माकोडे कुटूंबियावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुलगी जन्माला आल्यावर तिचे स्वागत व सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. या अभियानाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत सालोरा बुद्रूकने स्तुत्य पुढाकार घेत गावात जन्मलेल्या कन्यारत्नाच्या कुटुंबाचा सन्मान करून मुलींच्या जन्माबद्दल सकारात्मक संदेश दिला. १७ सप्टेंबर २०२५ नंतर गावात जन्माला येणाऱ्या मुलींचे स्वागत व सन्मान करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असून या अंतर्गत कन्यारत्न जन्म झालेल्या कुटुंबाला प्रोत्साहनपर सानुग्रह म्हणून ५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. या उपक्रमामागे मुलींचा सन्मान वाढवणे, समाजात स्त्री-पुरुष समानतेची जाणीव निर्माण करणे तसेच ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ या संकल्पनेला बळकटी देणे हा मुख्य उद्देश असल्याचे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रसंगी सरपंच ममता जाधव, उपसरपंच नीता धाकडे, सदस्य वैशाली राठोड, हिरालाल राठोड, शिक्षण समिती अध्यक्ष गणेश दयाराम राठोड, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनायक तसरे, चापालाल महाराज बहुउद्देशीय संस्थाध्यक्ष मदन महाराज यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक खेमराज जाधव, साहेब धाकडे, नंदू नागपुरे, राजा राऊत, प्रीतम तसरे, सुरेश तसरे, स्वप्निल राऊत, नंदू धाकडे, प्रकाश चव्हाण, अरविंद चव्हाण, निलेश राठोड, विश्वजीत बाखडे, निरंजन राठोड, विशाल जाधव, विशाल चव्हाण, अमर राठोड, सचिन जाधव, उमेश राठोड, अजय राठोड, गजानन राठोड, परसराम राठोड उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचारी वसुदेव चव्हाण, रोजगार सेवक बळीराम राठोड, उकंड राठोड, विजय जाधव, गणेश जाधव, गजानन वानखडे, संजय जाधव, आर्यन राठोड, प्रफुल कांबळे, गजानन मोहोळ, श्रीकृष्ण मनोहरे, पंजाब थोरात, सोनूसिंग बावरी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामपंचायत सालोरा बुद्रूकचा हा उपक्रम समाजात कन्यारत्न जन्माबाबत सकारात्मक विचार निर्माण करणारा, मुलींच्या सन्मानाला बळ देणारा ठरत असून, त्याचे कौतुक केले जात आहे. गावकरी मानतात अभिमानाची बाब ग्रामपंचायतीच्या या अभिनव उपक्रमामुळे गावात मुलगी जन्माला येणे हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण मानला जात असून ग्रामस्थांमध्येही सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. मुलगी ही कुटुंबाची व समाजाची संपत्ती असून, तिच्या जन्माचे स्वागत करण्याची परंपरा रुजवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत सालोरा बुद्रूक गावाने मुलीच्या जन्माचा सन्मान करण्यासाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे.१७ सप्टेंबर २०२५, नंतर गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक कन्यारत्नाच्या कुटूंबाला ५ हजार रुपयांचा प्रोत्साहनपर धनादेश देऊन अभिनंदन करण्यात येत आहे.या उपक्रमाने मुलीचा सन्मान वाढवणे समाजात स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणे व मुलींच्या जन्माकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हा उद्देश आहे.
अमरावती पती-पत्नीमध्ये वाद-संवाद हा काही नवीन प्रकार नाही. परंतु वादाचे पर्यावसान थेट घटस्फोटाच्या मागणीपर्यंत जावे आणि पुढे न्यायालयीन लढा उभा ठाकल्यानंतर ‘त्या’ दोघांनी सहजीवनाचा जुनाच मार्ग निवडावा, हा प्रकार मात्र विरळा आहे. गोड शेवटाचा असाच एक प्रकार अमरावतीच्या लोकअदालतीत घडला. त्यामुळे आले होते घटस्फोट घेण्यासाठी, मात्र परत गेले हातात-हात घेऊन अशी अलगद प्रतिक्रिया अनेकांच्या ओठातून बाहेर पडली. शनिवारी येथील कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या लोक अदालतीमध्ये पहिलेच प्रकरण निघाले ते म्हणजे आपसी संमतीने घटस्फोटाचे. ग्रामीण भागातील पती-पत्नीने ते दाखल केले होते. परंतु कालांतराने दोघांनीही फेरविचार केला आणि अखेर लोकअदालतीमध्ये या प्रकरणाचा शेवट करण्याचे ठरवून टाकले. त्यासाठी अर्थातच दोन्ही बाजूंचे वकील, न्यायालयाच्या समन्वयक आणि पॅनल ऑफ ॲडव्होकेटस् च्या सदस्यांचा सल्ला मात्र अत्यंत मोलाचा ठरला. आपसी सहमतीने घटस्फोट मिळावा, यासाठी हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश शेळके यांच्या समोर ठेवण्यात आले. दोघांमध्ये समन्वय रहात नसल्याने २ ऑगस्ट २०२५ रोजी या प्रकरणाचा न्यायालयीन प्रवास सुरु झाला. पुढे कौटुंबिक न्यायालयाच्या समन्वयक, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश तसेच उभयतांचे वकील यांनी हे कुटुंब तुटू नये आणि संसार उध्वस्त होऊ नये याकरिता विशेष प्रयत्न केले. पती-पत्नी दोघांचीही योग्य समजूत घातली. भविष्यातील दुष्परिणाम, विशेषत: त्यांच्या अपत्यांची होणारी आबाळ याचा नीट अंदाज त्यांच्या ठायी रुढ केला. अशाप्रकारे दोघांचेही समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे दोघांनीही आपली मागणी मागे घेत काही कारणास्तव रखडलेला सहजीवनाचा मार्ग पुन्हा एकदा स्वीकारला. कौटुंबीक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शेळके आणि पॅनल ऑफ ॲडव्होकेटस् समोर त्यांनी स्वत:च या बाबी स्पष्ट केल्या. अशाप्रकारे संपुष्टात येण्याच्या मार्गावर असलेला उभयतांचा संसार लोकअदालतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू झाला. यासाठी सर्व उपस्थितांनी या दोघांनाही शुभेच्छा दिल्या. लोक अदालतीमध्ये समेट घडल्यानंतर सदर्हु दाम्पत्याने न्यायाधीश व वकीलांचे आभार मानले. निकालानंतर काय म्हणाले दाम्पत्य... कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शेळके तसेच त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या पॅनल ॲडव्होकेट यांच्या उपस्थितीमध्ये पती-पत्नी न्यायालयात हजर झालेत आणि त्यांनी विद्यमान न्यायालयाला सांगितले की आम्ही आमच्या लहान मुलाचा आणि आमच्या संसाराचा विचार करून आपसी सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय रद्द केला आहे. मागील तीन महिन्यापासून आम्हा दोघांचेही वकील ॲड. चंद्रशेखर डोरले, ॲड. सुयश डोरले, ॲड. प्रथमेश गणेशकर आणि ॲड. निसार खान यांचे सांगणे आम्हाला पटले आहे. हेच आहे उद्दीष्ट माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या हेतूने लोक अदालत सुरू केली आहे, त्याचा असा सकारात्मक प्रभाव या प्रकरणाच्या निकालावरून किंवा तडजोडीवरून पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे. तुटण्याच्या काठावर पोहोचलेले एक सहजीवन पुन्हा एकदा सावरले, ही या उपक्रमाची सर्वात चांगली व जमेची बाजू ठरल्याची प्रतिक्रिया पॅनल ऑफ ॲडव्होतकेटसने दिली.
नगरपालिकेचे नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी शहरातील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी मोहीम हाती घेतली असून, त्याचाच भाग म्हणून ९ मार्च रोजी सर्वात जुनी ‘किल्ला’ शाळेला त्यांनी अचानक भेट दिली. यावेळी शाळेतील अस्वच्छ, दुर्लक्षित अवस्था पाहून संतापलेल्या नगराध्यक्षांनी कठोर कारवाई करत संबंधित शिक्षकांची एक पगारवाढ रोखण्याचे आदेश दिले. नगरपालिकेअंतर्गत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत मराठी व उर्दू माध्यमाच्या एकूण ९ प्राथमिक शाळा असून मराठी व उर्दू माध्यमाच्या दोन माध्यमिक शाळा आहेत. तसेच एक विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजही शहरात कार्यरत आहे. शहरातील नगरपालिकेच्या शाळांमधून अनेक मोठे अधिकारी घडल्याचा इतिहास असला, तरी काही वर्षांपासून शाळांची अवस्था दयनीय झाल्याचे चित्र आहे.वर्गखोल्यांच्या कोपऱ्यात कचऱ्याचे ढिग दिसत होते. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी जनावरेही राहू शकणार नाहीत, अशा अस्वच्छ जागी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात असल्याचेही दिसून आले. ही अवस्था पाहून नगराध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ सूचना देऊन न थांबता नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी स्वतः नगरसेवकांसह हातात झाडू घेऊन संपूर्ण शाळा व वर्गखोल्या स्वच्छ केल्या. त्यानंतर अस्वच्छता व कामातील हलगर्जीपणाबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांची एक पगारवाढ रोखण्याचा शेरा शेरेबुकात नोंदवत प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना तसे आदेश दिले. पुढील काळात नगरपरिषद शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. विद्यार्थ्यांची पटसंख्या किमान पाच पटीने वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही नगराध्यक्ष याप्रसंगी म्हणाले.यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून शाळेतील कचरा स्वच्छ केला. वर्गखोल्यांमधून दीड ट्रॉली कचरा बाहेर निघाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अशा परिस्थितीत कसे सुरू होते, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील नगरपालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी नगराध्यक्षांनी यापूर्वी वाशीम जिल्ह्यातील साखरा येथील जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेला भेट दिली होती. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी माजी प्राचार्य रवींद्र कोकाटे, विनोद हाडोळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप कावलकर, गोपाल वानखडे,मो. नईम यांचे मार्गदर्शनही घेतले जात असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्याध्यापकांच्या खोलीत सापडल्या गुटख्याच्या पुड्या ः किल्ला शाळेच्या भेटीदरम्यान नगराध्यक्ष गायगोले यांना अनेक धक्कादायक बाबी आढळल्यात. मुख्याध्यापकांच्या खोलीत गुटख्याच्या पुड्या सापडल्या, तर विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत गाळ साचलेला होता. महापुरुषांचे फोटो धुळीत माखलेले होते, तर विद्यार्थ्यांना वाटपासाठी ठेवलेली सुमारे ४०० ते ५०० प्रमाणपत्रे निष्काळजीपणामुळे खराब झाली होती. शासनाकडून दिलेले संगणक, मोठ्या स्क्रीनचा टीव्ही व ऑनलाइन शिक्षणाचे साहित्य वापराविना धूळ खात पडले होते. विद्यार्थ्यांसाठी आलेले नवीन टेबल-बेंच एका बंद खोलीत ठेवून दिले होते. ^शाळेला अचानक भेट दिली असता जागोजागी कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छतेची स्थिती पाहायला मिळाली. ही बाब गंभीर असून त्याबाबत संबंधित शिक्षकांची एक पगारवाढ रोखण्याची कारवाई करण्याचे तसेच शिपायाला निलंबित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.गावातील विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी नगरपरिषद अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व शाळा सुधारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अविनाश गायगोले , नगराध्यक्ष, नगरपरिषद अंजनगाव सुर्जी.
घरगुती गॅसच्या किमती गगनाला भिडल्या असून, दुसरीकडे गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने गृहिणींसह संपूर्ण कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. गॅस संपल्यामुळे नागरिकांना कामधंदा सोडून गॅस सिलिंडरसाठी लाईनमध्ये उभे राहावे लागत असून, त्यामुळे रोजगारावरही परिणाम होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेस व काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी नांदगाव खंडेश्वर येथे नाल्यालगत अनोखे प्रतीकात्मक आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘नरेंद्र सिलेंडर’ अशा घोषणा देत केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला. देशाच्या संरक्षणापासून ते नागरिकांच्या मूलभूत गरजांपर्यंत केंद्र सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सीमावरील सुरक्षेपासून ते देशांतर्गत महागाईपर्यंत सर्वच बाबतीत सरकारने शरणागती पत्करल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. अमेरिकेसमोर शरणागती पत्करल्यामुळे तेथील मालावर भारतात शुल्कमाफी मिळत असून, भारतातील शेतमाल अमेरिकेत निर्यात करताना ३० टक्के टॅरिफ लावण्यात येत असल्याने शेतमालाचे भाव घसरल्याचेही या वेळी सांगण्यात आले. पंतप्रधानांनी गटारातून गॅस गोळा करून त्यावर चहा बनवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत युवक काँग्रेसने नाल्यालगत आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित दादा जगताप, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक भगत, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमोल धवसे यांनी केले. यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मंगेश जोगे, मो. रियाज सय्यद मोफिक, अतुल ठाकूर, रमेश ठाकरे, राजेंद्र पारधी (सरपंच म.च.), पवन कारेकर, सुशील थोरात, समीर दहातोंडे, प्रमोद भाऊ इंझडकर, प्रदीप ब्राम्हणवाडे, रणजीत मेश्राम, पंकज वानखडे, सुरज सोनोने, तन्वीर , पंकज जगणे तसेच इतर काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी केरळमध्ये आयोजित १२ व्या राष्ट्रीय तांत्रिक प्रकल्प प्रदर्शन व स्पर्धा ''सृष्टी-२०२६'' मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाने राष्ट्रीय स्तरावर स्वेरी महाविद्यालयाचा आणि पर्यायाने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला आहे. केरळ राज्यातील कोट्टायम येथील सेंटगिट्स अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २३ व २४ फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा पार पडली. मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातून संपूर्ण भारतातून ७३ प्रकल्पांची नोंदणी झाली होती. त्यापैकी अत्यंत उत्कृष्ट अशा निवडक १० प्रकल्पांना राष्ट्रीय स्तरासाठी संधी मिळाली. यामध्ये महाराष्ट्रातून निवडलेला ‘स्वेरी'चा हा एकमेव गट ठरला, ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी ‘अॅटोमेटीक सिडबॉल मेकिंग मशीन’ या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण केले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या प्रकल्पाने पदवी स्तरावरील मेकॅनिकल गटात देशात तृतीय क्रमांक पटकावला. मानसी कंदी, शुभांगी सगर, गोविंद भंडारे व आशिष शिंदे या विद्यार्थ्यांच्या चमूने ही चमकदार कामगिरी केली. संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅम्पस इंचार्ज डॉ. एम. एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विभागप्रमुख डॉ. एस. बी. भोसले यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले. या प्रकल्पासाठी त्यांना प्रा. चेतन जाधव यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. केरळ येथे विभागप्रमुख डॉ. मन्नू रेमनन यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सांगोला नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. ७ व ९ मार्च रोजी विविध स्पर्धा व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाककला व ग्रुप नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाक कला स्पर्धेत अफरीन पठाण, मनीषा हुंडेकरी, नीता लाटणे, राजाबाई मस्के व ग्रुप डान्स स्पर्धेत युवा ग्रुप, सखी ग्रुप, धुरंदर ग्रुप, चौंडेश्वरी ग्रुप हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ बक्षिसाचे मानकरी ठरले. तर होम मिनिस्टर स्पर्धेत नेहा कावळे यांना पैठणीचा मान मिळाला. या कार्यक्रमाला जागतिक महिला दिनानिमित्त मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली होम मिनिस्टर तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन सांगोला येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती छाया मेटकरी, डॉ. निकिता देशमुख, अपेक्षा पाटील, पंचायत समिती सदस्या राणी पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉ.नेहा साळुंखे पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रसंगी बोलताना माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका राणी माने यांनी कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. यावेळी होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवून विविध खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला. यावेळी पाककला स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक तनुजा गवळी, छाया यादव, राजश्री महिमकर व डान्स स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक सदर कार्यक्रमात आयोजित केलेल्या बक्षीस वितरण समारंभात सांगोला शहरातील साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कवयित्री पुष्पाताई मिसाळ, मनीषा ठोंबरे, अर्चना देसाई, सुवर्णा तेली, हर्षदा गुळमिरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच प्रशासनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सायली पाटील यांचाही सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. मृणाल राऊत, शुभांगी पतंगे व सावित्रा कस्तुरे यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुळमिरे यांनी केले. या महिलांचा सन्मान
लातूर- मुरुड, ढोकी- येडशी, बार्शी- टेंभुर्णी महामार्गाचे चौपदरीकरण जलद गतीने पुर्ण करण्यासाठी अधिकचे २०५ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली. या मार्गाच्या चौपदरीकरणाकरीता यापूर्वीही ५७४ कोटी रुपये मंजुर करुन घेतले आहेत. धाराशिव, लातूर व बार्शी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लातूर, मुरुड, ढोकी, येडशी, बार्शी, टेंभुर्णी या प्रमुख मार्गाचे चौपदरीकरण व्हावे, अशी बऱ्याच वर्षापासून मागणी प्रलंबित होती. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खा. राजेनिंबाळकर यांनी लोकसभेच्या अधिवेशनात तसेच मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत दि.२९ सप्टेंबर २०१९, दि. २१ नोव्हेंबर २०२१ लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान प्रश्न विचारला होता. त्यानंतर दि. ९ मार्च २०२१ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लक्षवेधी प्रश्न विचारुन सभागृहाचे लक्ष वेधले होते. दि. ६ एप्रिल २०२१ रोजी मंत्री गडकरी यांची प्रत्यक्ष निवासस्थानी भेट घेवून प्रश्न मार्गी लावणे बाबत चर्चा केली. दि. ५ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासोबत बैठक घेवून त्यानंतर दि. २१ डिसेंबर २०२३ रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान नितीन गडकरी यांची भेट घेवून पाठपुरावा केला. दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी मंत्रीमहोदयांच्या निवासस्थानी या प्रश्नाच्या अनुषंगाने भेट घेवून अश्वासक चर्चा केली. सदर मार्गाच्या चौपदरीकरणाबाबत वारंवार पाठपुरावा करुन या मार्गाच्या चौपदरीकरणाकरीता अखेर दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी लातूर, मुरुड, ढोकी, येडशी, बार्शी, टेंभुर्णी महामार्गाच्या चौपदरीकरणाकरीता ५७४ कोटी मंजुर करुन घेतले. या मार्गाच्या कामास गती देवून काम लवकरात लवकर पूर्ण होण्याकरिता नियमीत पाठपुरावा चालू असून मार्गावरील येडशी बायपास व उर्वरित कामांसाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या रस्त्याच्या उन्नतीकरणासाठी केंद्र सरकारकडून २०५.२३ कोटी रुपये मंजूर करुन घेतले. तसेच प्रशासकीय व तांत्रिक मंजूरी मिळाली असून या निधीमुळे प्रलंबित कामांना गती मिळणार आहे. या कामामुळे या परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. सदरील काम लवकरात लवकर पुर्ण करण्याकरिता संबंधितांना सुचना केल्या असून कामाचा नियमीत आढावा घेणार असल्याचेही खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे. या महत्त्वाच्या मार्गाच्या विकासामुळे लातूर, मुरुड, ढोकी, येडशी, बार्शी, टेंभुर्णी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून व्यापार, उद्योग व दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बार्शी- टेंभुर्णी महामार्गाच्या सततच्या पाठपुराव्याला मिळाले यश
माळशिरस पं. स. नूतन सभापतींचा पदग्रहण:शिवसेना शिंदे गटाचे दत्तात्रय मगर यांची सभापती म्हणून वर्णी
माळशिरस पंचायत समितीच्या नवनिर्वाचीत सभापती व उपसभापती यांचा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील तसेच निमगाव व तालुक्यातील हजारो लोकांच्या उपस्थितीत पद ग्रहण समारंभ झाला. माळशिरस जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मोहिते पाटील व आ.जानकर यांनी दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना तसेच रिपाईशी युती करत तालुक्यातील १८ पैकी १२ जागा मिळवल्या होत्या. त्यामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या प्रत्येकी २ तर मुळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला ८ जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये मोहिते पाटील यांच्यातील माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील तसेच आमदार उत्तमराव जानकर यांच्या पत्नी विमल जानकर या विजयी उमेदवार असताना सभापती निवडी वेळी अचानक नाट्यमय घडामोडी होत सभापती पदासाठी दाखला केलेला वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांचा अर्ज मागे घेण्यात आल्याने शिवसेना शिंदे गटाचे दत्तात्रय मगर यांची सभापती म्हणून वर्णी लागली. यावेळी गटविकास अधिकारी आर.बी.पांढरे यांनी विजयसिंह मोहिते- पाटील यांच्यासह नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केल्यानंतर सभापती दत्ता मगर व उपसभापती मनीषा पाटील यांनी पदग्रहण केले.त्या वेळी बाहेर हालग्या तुताऱ्या यांचा गलागलाट सुरू होता. मोहिते पाटील व जानकर यांची ही राजकीय खेळी असली तरी त्यामुळे यानिमित्ताने निमगावला प्रथमच सभापती पदाची संधी मिळाली त्यामुळे निमगाव मध्ये जल्लोष झाला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आयोजित केला होता.राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील त्यासाठी आवर्जून उपस्थित होते. पदग्रहण कार्यक्रमासाठी पंचायत समिती कार्यालयाला फुलांनी सजविण्यात आले होते.मुख्य रस्त्यावर कमान करून तिथपासून सभापती कक्षापर्यंत फुलांचा सडा टाकण्यात आला होता. सभापती कक्ष व सभापती फलक,खुर्ची फुलांनी सजवली होती. कार्यालय फुलांनी सजवले
भाषा हे ज्ञान निर्मितीचे प्रमुख साधन आहे. ज्याला भाषेचा प्रभावी वापर करता येतो तो व्यक्ती विविध क्षेत्रांत यशस्वी होतो असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे स्मृतिकरंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, विश्वासराव काळे, उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर, डॉ. अनिल आठरे, प्रा. पोपटराव काळे, अशोकराव काळे आदी उपस्थित होते. भगवान श्रीकृष्णाने आपल्या वक्तृत्वाच्या सामर्थ्यावर अर्जुनाची बाजू अत्यंत चातुर्याने कशी मांडली हे सांगून वक्तृत्वाच्या कौशल्यामुळे योग्य-अयोग्य ठरवण्याची ताकद निर्माण होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकारण, समाजकारण व सार्वजनिक जीवनात वक्तृत्वाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने बोलण्याचा सल्ला दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी मनोगत व्यक्त करताना कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे यांनी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची विस्तृत ओळख करून दिली. संस्थेच्या सदस्या अरुणा काळे यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. तर प्रा. मेधाताई काळे यांनी कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. वैशाली भालसिंग यांनी करुन दिला. सूत्रसंचालन डॉ. अशोक गायकवाड यांनी तर आभार प्रा. राजेंद्र साबळे यांनी मानले. वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘जग तिसऱ्या महायुध्दाच्या छायेत’, ‘कृत्रिम बुध्दिमत्तेची शेती क्षेत्रातील भरारी’, ‘रिल्स संस्कृती’ असे विषय होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. शांतिलाल घेगडे व प्रा. रामदास कातकडे यांनी काम पाहिले. महाराष्ट्रातील विविध भागातून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. मीना साळे, प्रा. निलेश लंगोटे, प्रा. निखिल गोयल, प्रा. अनिकेत डमाळे, प्रा. भागवत ठाकूर, प्रा. मयूर रोहोकले, प्रा. विजया कोळेकर, प्रा. किशोर ताके व प्रा. सुवर्णा कदम आदींनी परिश्रम घेतले. वक्तृत्व स्पर्धेत आकाश मोहितेला प्रथम क्रमांक या वर्षीचा ह. कृ. तथा बाळासाहेब काळे करंडक न्यू आर्ट्स कॉलेज, पारनेरचा विद्यार्थी आकाश मोहिते याने पटकाविला, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सी. टी. बोरा महाविद्यालय, शिरूर येथील विलास दसगुडे, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पी. एन. पी. महाविद्यालय, अलिबाग येथील पंकज पांडुळे तर उत्तेजनार्थ पारितोषिक निखिल बोडखे यांनी मिळविले.
भगवंताच्या नामस्मरणाने मानवी देह पवित्र होतो. जीवनातील साध्य गाठायचे असेल तर त्यासाठी योग्य साधनांची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन हभप रामेश्वर महाराज राऊत यांनी केले. वद्य एकादशीनिमित्त सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम, नेवासा बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज तसेच सकल देवतांची पूजा व आरतीने करण्यात आली. सकाळी १० वाजता हभप रामेश्वर महाराज राऊत यांची कीर्तनरूपी सेवा पार पडली. पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, वाचे गाये राम सर्वभावे या अभंगावर त्यांनी प्रभावी निरूपण केले. माणसाचे अंतिम साध्य सुख आहे. मात्र माणूस प्रपंचरूपी साधना निवडतो, जी अनेकदा दुःखाचे मूळ ठरते. त्यामुळे खऱ्या सुखासाठी भजन, नामस्मरण आणि सेवा हीच खरी साधना आहे. कलियुगात कीर्तन व भजन ही साधना सर्वात सोपी आणि प्रभावी असल्याचे त्यांनी सांगितले. परमार्थ करताना अहंकार नसावा, भक्ताच्या जीवनात मोह-ममता नसावी आणि मनुष्याने काम, क्रोध व लोभ या तीन विकारांचा त्याग करावा, असेही त्यांनी मार्गदर्शन केले. संतांना समाजाकडून अनेकदा अवहेलना आणि त्रास सहन करावा लागला. तरीही साधूचा स्वभाव हा समाजाचा त्रास सहन करण्याचा असतो. आपल्याकडून कुणाचे चांगले होत नसेल तरी हरकत नाही; पण आपल्या कृतीमुळे कोणाचे नुकसान होऊ नये. आपल्या प्रमाणे दुसऱ्याला पाहणे हा सर्वोच्च परमार्थ आहे, असे त्यांनी सांगितले. कीर्तनानंतर विविध प्रकारची सेवा देणाऱ्या दात्यांचा राऊत महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हिंदू समाजाकडे शत्रुबोध, इतिहास बोध आणि स्वयंबोध असला पाहिजे, इतिहासातून आपण शिकलो पाहिजे. धर्माचे पालन करणे सर्वांचे काम आहे. संतांनी जाती भेदाच्या पुढे जाऊन कार्य केले. वारकरी संत मध्ये सर्व जाती धर्माचे संत होते, असे प्रतिपादन सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. श्रीगोंदे शहरात विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भूषण महाराज महापुरुष, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस,उपनगराध्यक् ष अलका अनभुले, नगरसेविका मीरा शिंदे,अनिल रामदासी, नगरसेवक वारकरी, भाविक, हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महंत रामगिरीजी महाराज म्हणाले, सनातन संस्कृती ही कधी नाश पावणारी नाही. सनातन हीच भारतीय संस्कृती आहे. अनेक परकीय आक्रमण आपल्यावर झाली पण सनातन संस्कृती टिकून आहे. हिंदू असंघटित असल्याचा फायदा आक्रमकांनी घेतला. सर्वांना एकत्रित करण्याचे काम संतानी केले.धर्म टिकवण्याचं काम संतानी केले.संत शेख महमद महाराज हे मुस्लिम असून वारकरी जीवन जगले ते पांडुरंगाचं भक्त होते. गझनीच्या मुहमदाने १७ वेळा सोमनाथ मंदिरावर आक्रमण केले. अशा अनेक आक्रमणांचा मारा होऊनही धर्म टिकून आहे. औरंगजेबचा भाऊ दारशुकोह हा उपनिषधाचा अभ्यासक होता. त्याला औरंगजेबाने मारले. इतिहासातून काही शिकलो नाही तर त्याची पुनरावृत्ती होते. याप्रसंगी संघाचे विभाग बौद्धिक प्रमुख कृष्णाजी घरोटे म्हणाले, समाज निर्माण करेल आणि हा समाज सर्व करील.संघ जीवनमान संघटना आहे. रोज समाज एकत्र येतो तो समाज सुसंघटित होतो. समाज परिवर्तनसाठी शक्ती गरजेची आहे. प्रास्ताविक डॉ.रविंद्र जंजिरे यांनी, सूत्रसंचलन श्रीपाद कुलकर्णी आणि आदित्य अनवणे यांनी तर आभार सुनील अनभुले यांनी मानले. चांगल्या विचाराच्या लोकांनीच पुढे यावे हिंदू धर्मात अनेक समाजसुधारक झाले. त्यांनी अनिष्ट प्रथा बंद केल्या. त्या प्रमाणे इतर धर्मातील समाज सुधारकांनी पुढे आले पाहिजे. प्रत्येक धर्मात चांगल्या वाईट विचाराचे लोक असतात पण वाईट बाजूला करण्यासाठी चांगल्या विचाराच्या लोकांनीच पुढे आले पाहिजे, असे आवाहन रामगिरी महाराज यांनी केले.
दहिगाव येथील श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टमध्ये पदाधिकारी निवड आणि बँक खात्याच्या कारभारावरून वाद निर्माण झाला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पदाधिकारी निवड केल्याचा आरोप ट्रस्टचे अध्यक्ष नागेश वाघ यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळावा, बँकेतील खाते क्रमांक ५१९४२ पूर्ववत करून सह्यांचे अधिकार पूर्ववत करावे या मागणीसाठी संबंधित विश्वस्त जिल्हा बँकेसमोर उपोषणास बसले. ट्रस्टचे अध्यक्ष नागेश वाघ, ट्रस्टचे विश्वस्त मधुकर म्हस्के, लक्ष्मण वाघ, अजिनाथ म्हस्के, संजय सावंत, गौतम हंबर्डे, महादेव म्हस्के, सचिन म्हस्के यावेळी उपस्थित होते. ट्रस्टची निवड धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार २२ डिसेंबर २०२३ रोजी केली होती. १४ जानेवारी रोजी पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली आणि १३ मार्च रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालयात बदल अर्ज दाखल केला. काही विश्वस्त बैठकांना गैरहजर राहिल्याने ९ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या सभेत पाच विश्वस्तांना कमी करण्याचा ठराव केला. दरम्यान, कमी केलेल्या विश्वस्तांनी नाराजी व्यक्त करत ट्रस्टमधीलच एका विश्वस्ताला सोबत घेऊन स्वतःचा गट तयार केला. त्यांनी ६ विश्वस्त असल्याचे दाखवत १५ डिसेंबर २०२४ रोजी पदाधिकारी निवड केल्याचे दर्शवून त्याचा बदल अर्ज ३१ डिसेंबर २०२४ रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल केला व जिल्हा बँक दहिगाव शाखेतील ट्रस्टच्या बचत खात्याच्या सही नमुन्यांत बदल केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, खात्याचे व्यवहार बंद करण्याचे शाखाधिकाऱ्यांना कळवले. पैसे खात्यात टाकता येतील पण काढता येणार नाही, असे बँकेचे लिगल अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील काही पतसंस्थांकडून बोगस ‘१०१’ वसुली दाखले देऊन कर्जदारांची लूट होत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले. पारंपरिक संबळ, हलगी आदी वाद्यांच्या गजरात करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, उत्तर जिल्हाध्यक्ष उत्तम पवार, युवा जिल्हाध्यक्ष राम कराळे, तालुका अध्यक्ष दत्ता वामन, पोपटराव दोंदे, विक्रम बेरड, संतोष खामकर, शिवराम पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच जागरण-गोंधळ सादर करणारे शाहीर कान्हू सुबे, नारायण सौदागर, जगन्नाथ शिकारी, साहेबराव पाटोळे, लक्ष्मण सौदागर, संतोष शेलार, रावसाहेब दातीर आदींचाही सहभाग होता. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, जिल्ह्यातील काही पतसंस्थांनी ‘१०१’ वसुलीच्या अंमलबजावणीसाठी असलेल्या नियमांचे पालन न करता मोठ्या प्रमाणात दाखले वितरण केले आहे. एनपीएचे निकष डावलून खोट्या खात्यांच्या आधारे वाढीव रक्कम वसूल केली जात असून त्यामुळे कर्जदारांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या सर्व प्रकरणांचे फेरलेखापरीक्षण करण्यात यावे तसेच संबंधित संस्थांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणीही त्यांनी केली. अनेक संस्थांनी बोगस ‘१०१’ वसुली दाखले मिळवून संस्था आणि निबंधक कार्यालयाच्या आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. सहकार कायद्याचे नियम डावलून एनपीएचे निकष, वसुली अंमलबजावणीची नियमावली आणि इतर कायदेशीर प्रक्रिया धाब्यावर बसवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काही प्रकरणांत खोट्या खात्यांच्या आधारे वैयक्तिक कर्ज देऊन त्यावर एकाच वेळी ‘१०१’ दाखले काढून बेकायदेशीर वसुली करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. काही संस्थांकडून संस्थेच्या नावाचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे निधी व ठेवी गोळा केल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला. सहकार खात्याच्या नावावर खुलेआम निधी उभारून गुंतवणुकदारांची फसवणूक केली जात असल्याने या सर्व व्यवहारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. संबंधित संस्थांचे परवाने तत्काळ रद्द करावेत वाहन कर्ज प्रकरणांतही नियमबाह्य पद्धतीने वाहन जप्त करून त्याची कायदेशीर प्रक्रिया न राबवता लिलाव केल्याचे प्रकार घडत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणले. अनेक संस्थांनी ‘१०१’ दाखले आणि ‘१३८’ अंतर्गत दाखल केलेल्या प्रकरणांची खाते-निहाय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित संस्थांचे परवाने तात्काळ रद्द करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बिबट्याचा हल्ला, युवक जखमी:इगतपुरी तालुक्यातील साकुर फाटा येथील घटनेने दहशत
इगतपुरी तालुक्यातील साकूर फाटा परिसरात २५ वर्षीय तरुणावर बिबट्याने झडप घालून गंभीर जखमी केल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि. १६) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. कुलदीप पंडित असे जखमी तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीप पंडित हे घराबाहेर गेले असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. प्रसंगावधान राखत त्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला; मात्र पळताना बिबट्याने त्यांच्या पायाला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या आरडाओरडीनंतर ग्रामस्थांनी धाव घेतली. लोकांची चाहूल लागताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. जखमी कुलदीप पंडित यांना प्रथम कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, तेथे काही वेळ उपचार घेतल्यानंतर तेथून सुट्टी घेत सध्या साकूर फाटा येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वन विभागाने तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. घटना सकाळी घडूनही वन विभागाचे अधिकारी सायंकाळपर्यंत घटनास्थळी न पोहोचल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. साकूर फाटा परिसरात अलीकडे बिबट्याचा वावर वाढल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून केल्या जात होत्या. याकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बिबट्याचा हल्ला होऊनही विलंबाने पोहोचल्याने वन विभाग प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ^साकूर फाटा येथील घटनेची माहिती आम्हाला मिळाली आहे. मात्र, संबंधित जखमी युवक आमच्या संपर्कात आला नाही. जोपर्यंत पुढील अधिकृत माहिती मिळत नाही, तोपर्यंत पुढील कारवाई करता येणार नाही. - दत्तू भोये, वनपाल, भंडारदरावाडी
नांदगाव विधानसभा मतदारसंघातील महिलांनी सक्षम व आत्मनिर्भर बनून जीवनमान उंचावण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. घराघरातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडू शकतो. महिलांनी घराची जबाबदारी सांभाळत सर्वांगीण प्रगती साधावी आणि स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे यावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अंजुम कांदे यांनी केले. मनमाड नगरपरिषद व महिला-बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा पार पडला, यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर नगराध्यक्ष योगेश पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी, शिवसेना गटनेते महेंद्र शिरसाट, करूणा योगेश पाटील, महिला व बालकल्याण सभापती पूजा लालसरे, उद्योजिका स्वाती गुजराथी आदींसह नगरसेवक उपस्थित होते. प्रारंभी महिला व बालकल्याण सभापती पूजा लालसरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करत कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. उद्योजिका गुजराथी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगत महिलांनी त्यांचे गुण अंगीकारल्यास समाजात मोठा बदल घडू शकतो, असे सांगितले. सावित्रीबाईंचा एक गुण जरी प्रत्यक्षात आणला तरी आपल्या जीवनात मोठी क्रांती घडू शकते, असे गुजराथी म्हणाल्या. नृत्यांकुर नृत्य संस्थेच्या संस्थापिका नेहा गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भरतनाट्यम नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी विशेष आकर्षण म्हणून पैठणी लकी ड्रॉ काढण्यात आला. या लकी ड्रॉमध्ये भाग्यवान ठरलेल्या ११ महिलांना पैठणीचे वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पैठणी प्राप्त झालेल्या महिलांनी आनंद व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. या उपक्रमामुळे उपस्थित महिलांचा उत्साह द्विगुणित झाला.
मातीशी नातं जपा; तीच तुमची ओळख:काकासाहेबनगर महाविद्यालयामध्ये स्वानंद बेदरकर यांचे प्रतिपादन
कलेचा उगम हा ग्रामीण भागातच होतो. तुम्ही ज्या मातीत श्वास घेता त्या मातीला कधीही विसरू नका. हीच माती तुमच्यावर संस्कार करत असते आणि तीच तुम्हाला जगात तुमची स्वतंत्र ओळख निर्माण करून देते, असे प्रतिपादन व्याख्याते व कवी स्वानंद बेदरकर यांनी केले. ते काकासाहेबनगर येथील के. के. वाघ शिक्षण संस्था संचलित के. के. वाघ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी ग्रामीण भागातील लोकसाहित्याच्या संपत्तीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी त्यांनी लोकगीत सादर करत विद्यार्थ्यांची दादही मिळवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ होते. त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. बी. एल. जाधव यांनी विद्यार्थ्यांमधील क्रियाशीलता आणि प्रतिभा ओळखण्यासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. व्यासपीठावर समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रामभाऊ पाटील, रघुनाथ कोल्हे, रामनाथ पानगव्हाणे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अतुल गवारे आदी उपस्थित होते. शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांत विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व पदके देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. सुनिता शिरसाठ यांनी केले तर आभार डॉ. प्रतिभा बाहेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
तहसील कार्यालयाच्या वतीने येथे महाराजस्व शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शासनाच्या तेरा विविध शासकीय विभागांच्या वतीने एकाच दिवशी ४१९ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये १५ वनपट्टेधारकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हिरामण खोसकर हे होते. यावेळी तहसीलदार गणेश जाधव, रवींद्र भोये, हिरामण जाधव, पुंडलिक साबळे, गोकुळ बत्तासे, राहुल शार्दुल आदींची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरामध्ये नागरिकांना मार्गदर्शन व प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल्स् लावण्यात आले होते. पोषण आहार, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, महिला बालकल्याणच्या योजनांची माहिती, निबंधक विभाग स्टॉलवर सहकारी संस्थांची नोंदणी, पीक कर्ज वाटप प्रक्रिया आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे मार्गदर्शन नागरिकांना करण्यात आले. कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, अशा शिबिरांचा लाभ कागदावर न दाखवता प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे मत व्यक्त करून शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र भोये यांनी सरकारला घरचा आहेर दिला. अध्यक्षीय भाषणात आमदार हिरामण खोसकर यांनी शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचतात. तसेच या शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक विभागाने लाभार्थ्यांना योग्य लाभ मिळावा, यासाठी महसूल विभागासह सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे, असा आदेश दिला. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिबिरात उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, सातबारा वाटप व फेरफार नोंदी दुरुस्ती, शेतकरी योजना, पीक विमा माहिती, नवीन बी-बियाणे व खत मार्गदर्शन, मृदा आरोग्य पत्रिका वाटप, अनुदानित कृषी अवजारे (ट्रॅक्टर, नांगर, फवारणी यंत्र) यांची माहिती, नवीन आधार नोंदणी, पत्ता/नाव/मोबाईल क्रमांक बदल व अद्ययावत करणे, बायोमेट्रिक अपडेट या सुविधांचा समावेश होता.
येथील मविप्र संचलित कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘विद्यार्थ्यांची जडणघडण आणि आत्मनिर्भर भारत’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप उत्साहात झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्यू. आय. पी. अंतर्गत आयोजित या परिसंवादात देशभरातून १५० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. दोन दिवस चाललेल्या या बौद्धिक सोहळ्यात विविध तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी भोपाळ येथील डॉ. अंजना तिवारी आणि पुणे येथील डॉ. प्रीती जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास, मूल्यसंस्कार आणि शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपावर विचार मांडले. दुसऱ्या दिवशी अमरावतीचे डॉ. प्रशांत गवांडे, जळगावच्या डॉ. मोनाली खाचणे तसेच पुण्याचे डॉ. संजय ढोली यांनी आत्मनिर्भर भारत घडविण्यात शिक्षण व युवकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन मविप्र संस्थेचे इगतपुरी तालुका संचालक अॅड. संदीप गुळवे, महाविद्यालय विकास व स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य वैशाली आडके, ज्ञानेश्वर कोकणे आणि सुनील रोकडे यांच्या उपस्थितीत झाले. प्राचार्य डॉ. किरण रकीबे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम झाला. सहभागी प्रतिनिधींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. परिसंवादात देशभरातील विविध विद्यापीठांमधून आलेले सुमारे १०० हून अधिक शोधनिबंध तांत्रिक सत्रांमध्ये सादर करण्यात आले. ‘विद्यार्थ्यांची जडणघडण व आत्मनिर्भर भारत’ या विषयावर आधारित या संशोधनांमुळे चर्चेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. सर्व संशोधन निबंधांचे दोन पुस्तकांच्या स्वरूपात प्रकाशन करण्यात आले.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी २७ लाख ५० हजारांचा निधी उपलब्ध झाला असून, यातून ६५ मीटरचा सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार केला जात आहे. विष्णू महाराज सास्ते यांच्या हस्ते रस्ता कामाचे उदघाटन झाले. त्यामुळे वर्षानुवर्षे चिखल, खड्डे चुकवत ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, शेतकरी, व्यापाऱ्यांसह प्रवाशांना रस्ता पुर्ण झाल्यावर दिलासा मिळणार आहे. शाळेत ये-जा करताना विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत, शेतकऱ्यांचीही शेतमाल आणण्यासाठी कसरत होत. पावसाळ्यात दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात जागो-जागी पाण्याचे डबके साचल्याने व्यापारी व ग्राहकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच रेणुकामातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही याचा त्रास होत. त्यामुळे आमदार संतोष दानवे यांनी पुढाकार घेऊन या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे हा रस्ता केवळ वाहतुकीसाठी नव्हे तर गावाच्या विकासासाठीही महत्त्वाचा मानला जात आहे. ग्रामीण भागातील विकासकामांमध्ये पायाभूत सुविधांना मोठे महत्त्व असते, यातही रस्त्यांची सुविधा झाल्यास शिक्षण, शेती, आरोग्य, इतर सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होतात. पिंपळगाव रेणुकाई येथील हा रस्ता देखील त्यादृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
धरणाचे पाणी अचानक सोडल्यामुळे करंजगावमधील शेतकऱ्याचा मृत्यू
बोर दहेगाव बोर दहेगाव धरणातून सोमवारी दुपारी ३००-४०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. जलसंपदा विभागाने बोर नदीकाठच्या गावांना, शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. सायंकाळी करंजगाव येथील ७४ वर्षीय शेतकरी भानुदास गंगाधर मगर नदी ओलांडत होते. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची बैलगाडी नदीत वाहून गेली. या घटनेत शेतकरी मगर नदीच्या पाण्यात वाहून गेले. त्यांच्यासोबतची गायही वाहून गेली. बैल वाचला. घटनेनंतर करंजगावचे ग्रामस्थ, तरुणांनी नदीपात्रात शोध घेतला. मगर हे करंजगाव शिवरातील बोर नदीवरील समृद्धी महामार्गाच्या पुलाला अडकलेले आढळले. गाय पाण्यात वाहून मृत झाल्याचेही दिसून आले. भानुदास मगर सकाळी नेहमीप्रमाणे बोर नदी ओलांडून शेतात गेले होते. संध्याकाळी घराकडे परतताना धरणाचे पाणी सोडल्याची माहिती नसल्याने ते गाडी, बैलासह पाण्यात वाहून गेले. या घटनेचा निषेध करत करंजगाव ग्रामस्थ, माजी जि. प. सदस्य मनाजी पाटील मिसाळ यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी, अभियंता, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तीन तास वाहतूक ठप्प दरम्यान, नदीचे पाणी नागपूर मुंबई महामार्गांवरील पुलावर आल्यामुळे तीन तास वाहतूक ठप्प होती. सायंकाळी विसर्ग बंद केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. वरिष्ठांच्या आदेशाने पाणी सोडले होते ः अधिकारी प्रकल्पाच्या खालच्या बाजूच्या करंजगाव, जळगाव, खिर्डी ग्रामपंचायतकडून १ लाख ६७ हजार रुपयांची पाणीपट्टी पिण्याच्या पाण्यासाठी भरण्यात आली आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून पाणी सोडण्याच्या आदेशानुसार पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
खुलताबाद सालुखेडा शिवारातील शेतकरी बाळू उत्तम काळे यांच्या दोन एकरांवरील टरबूज पीक निकृष्ट दर्जाच्या रोपांमुळे पूर्णपणे नष्ट झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे सुमारे १० ते १५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्याने केला आहे. सदर कंपनी व रोपवाटिकेविरोधात शेतकऱ्याने कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. भरपाई न मिळाल्यास सहकुटुंब आंदोलन करण्याचा इशाराही शेतकरी बाळू काळे यांनी दिला आहे. सालुखेडा येथील गट क्रमांक ४८ मधील दोन एकर क्षेत्रावर शेतकरी बाळू काळे यांनी ३ जानेवारी रोजी टरबूजाची लागवड केली होती. यासाठी सुमारे ८ हजार रोपे खरेदी केली होती. या रोपांसाठी त्यांनी सुमारे २३ हजार रुपये खर्च केला होता. एकूण त्यांना दीड ते दोन लाखांचा खर्च आला होता. सामान्यतः टरबूज पिकाला ७० ते ७५ दिवसांचा कालावधी लागतो. मात्र यंदा लागवड केलेल्या रोपांपासून तयार झालेली फळे अवघ्या ५० दिवसांतच पिवळी पडू लागली. फळांवर डाग येऊन ती सुकून गेली व वेलावरच वाळून पडल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. सालुखेडा येथे शेतकऱ्याच्या हाती आलेले टरबुजाचे पीक अशाप्रकारे वाया गेले आहे. समिती करणार चौकशी या संदर्भात तालुका कृषी अधिकारी डी. एस. तारगे यांनी सांगितले की, संबंधित शेतकऱ्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची चौकशी बियाणे तक्रार निवारण समितीमार्फत करण्यात येईल. भरपाई देण्यासाठी पाठपुरावा करू बाळू काळे यांच्यावर अन्याय होणार नाही, यासाठी आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत. शेतकऱ्याला योग्य नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल. आवश्यकता भासल्यास आमदार प्रशांत बंब तसेच राज्याचे कृषी मंत्री यांची भेट घेऊन हा प्रश्न शासन स्तरावर मांडला जाईल, असे पंचायत समिती सभापती सुनीता खंडागळे यांनी सांगितले.
पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर पैठण शहरात धार्मिक वातावरणासोबत खाद्यसंस्कृतीचीही रंगत वाढली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा खाद्यपदार्थांचे विशेष भाव वाढले नाहीत. पण, सफरचंदासह इतर फळांचे भाव मात्र वाढले. त्यामुळे रमजानमध्ये काही पदार्थांवर महागाईची छाया दिसते. रोजा सोडण्याच्या इफ्तारवेळी चविष्ट, पौष्टिक पदार्थांची परंपरा आहे. त्यामुळे शहरातील भाजी मार्केट, मशीद परिसर, प्रमुख चौकांमध्ये रमजाननिमित्त खास खाद्यपदार्थांचे स्टॉल्स वाढले आहेत. दिवसभर उपवासानंतर सायंकाळी इफ्तारला खजूर, फळे, सरबत, फळांचे ज्यूस, तळलेले पदार्थ खाल्ले जातात. शहरात समोसे, भजी, कटलेट, चिकन रोल, कबाबची विक्री वाढली आहे. गोड पदार्थांत शिरखुर्मा, फिरनी, खजूर, विविध हलवे मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. यंदा काही साहित्यांच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली. सुकामेवा, खजूर, दूध, साखर, तळणीचे तेल महागले. त्यामुळे काही खाद्यपदार्थांचे दरही थोडे वाढले. तरी इफ्तारसाठी पारंपरिक पदार्थांची खरेदी कायम आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मुख्य बाजारपेठ, मशीद परिसर, प्रमुख चौकांमध्ये सायंकाळी स्टॉल्सवर मोठी गर्दी होते. घराघरांतून खरेदी सुरू आहे. तरुणही मित्रपरिवारासोबत या पदार्थांचा आस्वाद घेत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते रमजानमध्ये इफ्तारसाठी मागणी वाढते. बाजारपेठेला चांगली चालना मिळते. धार्मिक वातावरणासोबत स्थानिक अर्थचक्रालाही गती मिळते, असे सामाजिक कार्यकर्ते मुफिद पठाण यांनी सांगितले. मागील वर्षी १००-१५० रुपये किलो असलेले सफरचंद आता २२० रुपये किलो आहे. अंगूर मागील वर्षी ८० रुपये किलो होते, ते आता १२० रुपयांवर गेले आहे. तर टरबुजांच्या दरातही दहा रुपयांची वाढ झाली आहे.
पापमोचनी एकादशी म्हणजे केलेल्या पापातून मुक्ती देणारी एकादशी होय. या दिवशी तुळशीला पाणी घालावे. भगवान विष्णूची पूजा करावी. पापातून, दुःखातून, अन्यायातून मुक्ती मिळते, या दिवशी अन्न ग्रहण करू नये, फलाहार घ्यावा, असे आवाहन महंत गणेशानंद शास्त्री यांनी केले. पापमोचनी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र भगवानगड, मेहेगाव वारीत महंत गणेशानंद शास्त्री यांचे प्रवचन झाले. यावेळी ते बोलत होते. नारायण भगवानाच्या प्राप्तीसाठी वनात जाण्याची गरज नाही, असे महंतांनी स्पष्ट केले. शुद्ध अंतःकरणाने भक्ती केल्यास मनाला सुख मिळते, असे त्यांनी सांगितले. सुखाची व्याख्या सांगताना त्यांनी न्यायशास्त्रातील अर्थ मांडला. जे अनुभव आत्म्यास अनुकूल वाटतात त्याला सुख म्हणतात, असे त्यांनी सांगितले. माउलींची व्याख्या सांगताना त्यांनी “किंबहुना सोये, जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होये, तया नाम सुख” असा उल्लेख केला. जीव आणि आत्मा यांचा संयोग झाल्यानंतर जे अनुभवास येते त्याला सुख म्हणतात, असे त्यांनी सांगितले. संसारात सुखाचे विषय वेगळे असतात, असे महंतांनी सांगितले. परमार्थात संतांशिवाय, देवाशिवाय कशातही सुख नाही, असे त्यांनी म्हटले. उदाहरण देताना त्यांनी शाळा तपासणीला आलेल्या अधिकाऱ्याची गोष्ट सांगितली. पहिल्या वर्गात “सात त्रिक किती” विचारल्यावर एकाने “दहा” सांगितले. दुसऱ्याने “पन्नास” सांगितले. अधिकारी नाराज होऊन दुसऱ्या वर्गात गेले. तिथे विद्यार्थ्यांनी “सात त्रिक”ला “२१” असेच उत्तर दिले. पहिला वर्ग संसारी लोकांचा आहे. सुखाची व्याख्या वेगवेगळी आहे. दुसरा वर्ग साधू-संतांचा आहे. सुखाची व्याख्या एकच आहे, असे त्यांनी सांगितले. २ क्विंटल फराळाचे वाटप वासडी मेहेगाव भगवानगडावर दर एकादशीला १ क्विंटल साबुदाणा, अर्धा क्विंटल शेंगदाणे, अर्धा क्विंटल बटाटे यांचा फराळ भाविकांसाठी ठेवला जातो. तपोवन, निंभोरा, देवपुळ, हस्ता, रामनगर, पळशी, साखरवेल, मेहेगाव, पुरनवाडी, पिशोर, कन्नड, संभाजीनगर, बजाजनगर, जाधववाडी, शिवराई, सासेगाव येथील भाविक उपस्थित होते.
सिल्लोड तालुक्यासह घाटनांद्रा परिसरात पुढील काही दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रब्बी हंगामातील प्रमुख पिके असलेल्या गहू व हरभऱ्याची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. काढलेले पीक सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकरी शेतशिवारात धावपळ करताना दिसत आहेत. अवकाळी पावसाच्या भीतीने मळणीच्या कामालाही मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. मात्र अनेक ठिकाणी उफणेर यंत्र उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. काही भागांत गव्हाची काढणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. काढणी व मळणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. काढलेला गहू व हरभरा ओला होऊन नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी ताडपत्री व प्लास्टिक कव्हरचा वापर करून पीक सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी हार्वेस्टरच्या साहाय्याने मळणी सुरू आहे. मात्र अचानक वाढलेल्या कामामुळे हार्वेस्टर मशीनची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मशीन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीनेही काढणी करताना दिसत आहेत. अवकाळीचा अंदाज लक्षात घेऊन शेतकरी आपल्या कुटुंबीयांसह दिवस-रात्र शेतातच थांबून पीक वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अचानक वाढलेल्या कामामुळे मजूर टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनेच कामे उरकावी लागत आहेत. काढलेला गहू व हरभरा लवकर मळून गोदामात किंवा घरात सुरक्षित ठेवण्याची शेतकऱ्यांची घाई सुरू असल्याचे परिसरातील शेतकरी दीपक मोरे, रवी निकम, शिवाजी अहिरे आदींनी सांगितले. बदलत्या हवामानामुळे घाटनांद्रा परिसरातील शेतशिवारात काढणी-मळणीची लगबग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संभाव्य अवकाळी पावसापासून पीक वाचवण्यासाठी शेतकरी वर्ग युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. मजूर मिळत नाहीत व मशीनसाठीही प्रतीक्षा : या वर्षी पीक चांगले आले आहे. मात्र पावसाची भीती सतत डोक्यावर आहे. मजूर मिळत नाहीत. मशीनसाठीही प्रतीक्षा करावी लागत आहे. पाऊस आला तर मोठे नुकसान होईल अशी भीती वाटते, असे येथील शेतकरी संजय सुलताने यांनी सांगितले. काढून ठेवलेला गहू शेतात ठेवणे शेतकऱ्यांसाठी धोक्याचे अवकाळी पावसाचा अंदाज असल्यामुळे काढलेला गहू शेतात ठेवणे धोक्याचे झाले आहे. उफणेर मशीन वेळेवर मिळत नसल्याने मळणी उशिरा होत आहे. त्यामुळे रात्रंदिवस शेतात थांबून काम करावे लागत आहे, असे घाटनांद्रा येथील शेतकरी बद्रीनाथ चौधरी यांनी सांगितले.
80 प्रकरणांत तडजोड, 76 लाखांची वसुली:सिल्लोड येथे पार पडली राष्ट्रीय लोकअदालत
सिल्लोड येथे शुक्रवार रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये ८० प्रकरणे निकाली काढण्यात आली. दिवाणी न्यायालय येथे घेण्यात आलेल्या या लोकअदालतीच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) सुशील श. देशमुख उपस्थित होते. या लोकअदालत मध्ये एकूण तीन पॅनल होते. त्यासाठी सह दिवाणी न्यायाधीश मनोज किरमे, सह दिवाणी न्यायाधीश आकाश तट्टू, तालुका वकील बारचे अध्यक्ष अॅड. अशोक तायडे, इतर वकील उपस्थित होते. एकूण ८० प्रकरणांत तडजोड झाली. अनेक दिवसांपूर्वी तुटलेले संसार जोडले गेले. ते पुन्हा नांदायला लागले. या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये एन. आय. अॅक्ट १३८ चे ३३ प्रकरणे, गुन्हा कबुलीची ३१ प्रकरणे, विविध बँकांची ६ प्रकरणे, वादपूर्व ७ प्रकरणे यांत तडजोड झाली. एकूण ७६ लाख ३७ हजार ६०० रुपयांची वसुली करण्यात आली. यावेळी पॅनल पंच म्हणून अॅड. के. एस. कळम, अॅड. आर. टी. ताटे यांनी काम पाहिले. यासाठी अधीक्षक आर. जी. गायकवाड, सहाय्यक अधीक्षक आनंद सुरडकर, तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायालयीन कर्मचारी यांनी काम पाहिले. यासाठी सिल्लोड शहराचे पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
सातवाहन काळात इ.स.पू. दुसऱ्या शतकापासून ते इ.स. तिसऱ्या शतकापर्यंत पैठण हे अत्यंत महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. सातवाहन राजवंशाची राजधानी असलेल्या पैठणमधून इराण, अरबस्तान, रोमन साम्राज्याशी थेट व्यापार होत असल्याचे अनेक ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्या काळात पैठण हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख केंद्र मानले जात होते. सध्या इराणविरोधी अमेरिकेच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पैठण व इराणचा व्यापार एकेकाळी कसा चालत होता, याचे पुरावे आजही पैठण येथील बाळासाहेब पाटील वस्तुसंग्रहालयात उपलब्ध आहेत. पैठणमधून पश्चिम आशिया, इराण, रोम, अरबस्तान, इजिप्त तसेच दक्षिण-पूर्व आशियातील बर्मा (म्यानमार) आणि मलाया या प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असे. पैठण येथून प्रामुख्याने मलमल, सुती कापड, उत्कृष्ट दर्जाची वस्त्रे, सुगंधी द्रव्ये, गंधक, मसाले, हस्तीदंत तसेच विविध औषधी वनस्पतींची निर्यात केली जात असे. विशेषतः पैठणची उत्कृष्ट कापडनिर्मिती आणि सुगंधी द्रव्ये इराणसह परदेशात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होती. त्याच्या बदल्यात इराण (पर्शिया), अरबस्तान आणि रोम या देशांमधून वाइन, द्राक्षांचा रस, तांबे, कथील, शिसे, कोरल तसेच सोने-चांदी यांची आयात केली जात होती. या व्यापारामुळे पैठणची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर समृद्ध झाली होती. मालाच्या वाहतुकीसाठी पैठण–नाणेघाट हा महत्त्वाचा व्यापारी मार्ग पैठणमधील मालाची वाहतूक करण्यासाठी पैठण–नाणेघाट हा महत्त्वाचा व्यापारी मार्ग वापरला जात असे. नाणेघाट येथे सातवाहन काळातील जकातीचे रांजण आणि शिलालेख आजही पाहायला मिळतात. या मार्गाने पुढे कल्याण, सोपारा आणि भरुच (भरुकच्छ) या पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख बंदरांमार्फत सागरी मार्गाने परदेशात माल निर्यात केला जात असे. उत्खननात सापडलेल्या वस्तू देतात व्यापाराची साक्ष पैठण आणि तेर (तगर) येथे झालेल्या पुरातत्त्व उत्खननात सापडलेली मातीची भांडी, सुरया, हस्तीदंती बाहुल्या, विविध वस्तू तसेच नाणी या व्यापाराची साक्ष देतात. या वस्तूंवरून त्या काळात पैठणमधून परदेशात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची निर्यात होत असल्याचे स्पष्ट होते.
इराण, इस्त्रायल, अमेरिका युद्धाच्या तणावाचे पडसाद आता थेट शेतकऱ्यांवर उमटत आहेत. अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्यात मार्गांवर परिणाम झाला. मोठ्या प्रमाणात शेतमाल देशांतर्गत बाजारात आला. भाज्या, फळे, इतर शेतमालाची आवक वाढली. दर कोसळले. टरबुजाच्या भावातही मोठी घसरण झाली. पंधरा दिवसांपूर्वी २५ किलोचे टरबुज विकले जात होते. आता ८ ते ९ किलो प्रमाणे विक्री होत आहे. शेतकरी हतबल झाला आहे. टरबुज हे अवघ्या तीन महिन्यात भरघोस नगदी उत्पन्न देणारे पीक आहे. त्यामुळे लागवड मोठ्या प्रमाणात वाढली. रमजान महिन्याच्या सुरुवातीला बाजारात टरबुजाला २५ ते ३० रुपये प्रतिकिलो भाव मिळत होता. तो अचानक ८ ते ९ रुपयांवर आला. अवघ्या १५ दिवसांत बाजारपेठेतील चित्र पालटले. शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले. उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले. कलिंगडाचा हंगाम जानेवारीत सुरू होतो. पहिल्या टप्यात मागणी कमी असते. उन्हाचा चटका वाढला की मागणी वाढते. सध्या हंगाम बहारात आहे. बाजारात उच्चांकी आवक होत आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यात सर्वाधिक मागणी असते. जूनमध्ये हंगाम संपतो. यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता, रमजान यामुळे मागणी मोठी होती. मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला. शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घेतले. सुरुवातीला २ ते अडीच लाख उत्पन्नाची आशा होती. शेतकरी पीक जीवापाड जपत होता. १५ दिवसांनंतर आवक वाढली. मागणी घटली. भावात मोठी घसरण झाली. सुरुवातीचे चित्र आशादायक होते. अचानक घसरणीने मोठे नुकसान होत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे आधाराची अपेक्षा व्यक्त केली. कधीकाळी शेजाऱ्यांना वानोळा म्हणून दिले जाणारे कलिंगड आता नगदी पीक म्हणूनही तोट्यात जात आहे. ऐन रमजान महिन्यात, कडक उन्हाळ्यात व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. मागणी असतानाही भाव पडले. शेतीवर विसंबून असलेल्या कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले. कलिंगड पिकासाठी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च लागतो. सुधारित वाण, महागडी खते, कीटकनाशक फवारणी, मजुरीचा खर्चही होतो. सध्या १० ते १२ रुपये भाव मिळत आहे. लागवड, वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे. शेतातील उभे पीक तोडायचे की नाही, या संभ्रमात शेतकरी आहे. वाहतूकीचा खर्च निघणे कठीण : कलिंगड लागवडसाठी शेतात मल्चिंग पेपरसह एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च केला. आणि त्यावर खते, कीटकनाशक फवारणी देखील वेळोवेळी केली. यावर्षी उन्हाळ्यातच रमजान महिना असल्याने चांगला भाव मिळेल असे वाटले होते. मात्र १५ दिवसांतच २५ रुपयावरचा भाव ९ ते १० रुपयांवर आहे. वाहतुकीचा खर्चही निघणे कठीण झाले असल्याचे दह्याळा येथील शेतकरी उमेश बर्वे यांनी सांगितले.
वैजापूर तालुक्यातील खंडाळा, भिवगाव, परसोडा रस्त्याच्या मजबुतीकरणाला २० ते २५ वर्षांनंतर सुरुवात झाली. भिवगाव परिसरात ठेकेदाराने मुरमाऐवजी शेतातील काळी माती टाकली. ग्रामस्थांनी काम निकृष्ट असल्याचा आरोप केला. २ एप्रिल २०२३ रोजी रविवारी काम बंद पाडले. त्यानंतर ठेकेदाराने काळी माती काढली. मुरमाचा भराव टाकला. काम पुन्हा सुरू झाले. मध्येच वर्षभर काम बंद पडले. एप्रिल २०२४ मध्ये खडीकरण सुरू झाले. खडीकरण खंडाळा ते परसोडा पूर्ण झाले. डांबरीकरण मात्र गेल्या दोन वर्षांपासून रखडले. ठेकेदारामुळे वाहनचालक, प्रवाशांची डोकेदुखी वाढली, असे चित्र आहे. रस्त्यावर मोठमोठे दगड वर आले आहेत. दगडांवरून दुचाकी घसरते. दररोज अपघात होतात. दुचाकीस्वार जखमी होण्याचे प्रकार वाढले आहेत. ग्रामीण भागातील रस्ते चांगले व्हावेत, खेड्यांचा संपर्क महामार्गावर लवकर व्हावा यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर होतो. मात्र निधीचा ठेकेदार दुरुपयोग करत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. या गंभीर बाबीकडे बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची खंतही व्यक्त होत आहे. खंडाळा ते परसोडा डांबरीकरणाला २० ते २५ वर्षांनंतर मंजुरी मिळाली. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षांचा विलंब झाला. तरीही काम अपूर्ण आहे. या अपूर्ण रस्त्यावरून गहू, कांदा, इतर पिकांची वाहतूक करताना धान्य रस्त्यावर गळते. काही वेळा ट्रॅक्टर उलटतात. नुकसान शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे. परसोडा येथील हॉटेल व्यावसायिक ऋषिकेश जाधव यांनी सांगितले, मी परसोड्यात राहतो. खंडाळ्यात हॉटेल आहे. रोज या रस्त्यावरून ये-जा करतो. पूर्वी रस्ता बरा होता. अपघात होत नव्हते. टायर पंक्चर होत नव्हते. आता नेहमी अपघात होतात. अनेकदा रात्री गाडी ढकलत नेण्याची वेळ आली. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण तातडीने होणे गरजेचे आहे. प्रवाशांची हेळसांड थांबवा ^सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या कामात ठेकेदारांकडून हलगर्जीपणा सुरू असल्याचे चित्र आहे. या कामाकडे संबंधित कामाचे अभियंता दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. या सर्व प्रकाराकडे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी यांच्यावर तात्काळ लक्ष देऊन खंडाळा ते परसोडा रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर करून प्रवाशांची व वाहन चालकांची होणारी हेळसांड थांबवावी. -दादासाहेब घायवट, ग्रामस्थ पानगव्हाण लवकरच काम सुरू होईल ^खंडाळा ते परसोडा रस्त्याच्या डांबरीकरण बाबत डांबर उपलब्धतेबाबत काही तरी अडचण निर्माण झालेली होती. सध्या ती अडचण दुर झाली असून या आठवड्यात डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे संबंधित ठेकेदाराकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे लवकर काम सुरु होईल. अजित रोडगे- उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वैजापूर
गतवर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाची आवक वाढल्याचे चित्र मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूर स्टेशन येथील बाजार समितीत दिसून येत आहे. रविवारी आडत मार्केटला सुटी असल्याने सोमवारी बाजार समितीत शेतमाल घेऊन आलेल्या वाहनांमुळे ट्रॅफिक जाम झाली होती. सोमवारची आवक पाहता सुमारे पाच हजार क्विंटल गहूविक्रीसाठी अडत व्यापाऱ्यांच्या दुकानावर आला होता. आवक वाढल्याने गतवर्षीच्या तुलनेत गव्हाच्या दरात ५०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीयाच दिवसात गव्हाला २८५०, तर आता २३०० रुपयांचा भाव मिळत आहे. चालू मार्च महिन्याच्या १६ दिवसांततब्बल १७ हजार क्विंटलपर्यंत गव्हाची येथे आवक झालीतर ज्वारीची ६ हजार क्विंटल आवक झाली. पण,तेजीच्या भावात ज्वारीच सरस आहे. शेतमालाच्यालिलाव बिटात चांगल्या गव्हाला २३२५ प्रतिक्विंटल, तरसरासरी २१५० रुपये क्विंटलप्रमाणे भाव मिळत आहे. एकनंबर क्वॉलिटी ज्वारीला पाच हजार रुपये तर सरासरी साडेचार हजार रुपये क्विंटलप्रमाणे भाव मिळत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव संतोष पवारयांनी दिली. कोंडी सोडवा, शिल्लेगाव पोलिसांना दिले निवेदन लासूर स्टेशन येथील बाजारपेठेतगव्हाची आवक वाढत असल्यानेशेतमाल विक्रीसाठी घेऊनयेणाऱ्या वाहनांची संख्या दररोजवाढत चालली आहे. त्यामुळेट्रॅफिक जाम होत आहे. विशेष म्हणजे बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोरच रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजूने अरुंदरस्ता असल्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सतावत आहे. दोन दिवसांपूर्वी बाजार समितीने वाहतुकीची कोंडी थांबवण्यासाठी शिल्लेगाव पोलिसांना निवेदन दिल्याचे सभापती शेषराव जाधव यांनी सांगितले. शहरी नागरिकांकडून ज्वारीची मागणी अधिक यंदाही ज्वारीला गव्हापेक्षा जास्त भाव मिळत आहे. ज्वारीची भाकरीखाणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याने ज्वारी खरेदीकडे स्थानिकग्राहकांचा ओढा कमी होत आहे. मात्र, मुंबई-पुणे छत्रपती संभाजीनगरसहविविध शहरांत ज्वारीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकगरिबांची भिस्त स्वस्त धान्य दुकानातील मोफत गव्हावरच आहे.
निवृत्त प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर आता अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. ५० लाखांच्या देवाण-घेवाणीसह यामागे एका मोठ्या ‘हनी ट्रॅप’आणि ब्लॅकमेलिंगचे रॅकेट कार्यरत असल्याचे वास्तव पोलिस चौकशीत समोर येत आहे. लोंढे यांची हत्या केल्यानंतरही मुख्य आरोपी विशाल राठोड हा चक्क नातेवाइकांसोबतच पोलिस ठाण्यात वावरत होता. “मी दोन दिवसांत त्यांना शोधून आणतो,’ अशी थाप मारून तो पोलिसांना आणि लोंढे यांच्या कुटुंबीयांना महिनाभर चकवा देत होता. दरम्यान, या प्रकरणातील तिसरा आरोपी करण विलास आढे (२२, रा. गिरनेर तांडा) याला न्यायालयाने १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपी विशाल याने त्याच्या गावातच लाला नावाच्या मराठी चित्रपटाचे शूटिंगही केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी विशाल पुण्याच्या टोळ्यांच्या संपर्कात मुख्य आरोपी विशाल राठोड हा गुन्हेगार असून यापूर्वीही त्याने एका लैंगिक अत्याचाराची तक्रार आर्थिक तडजोड करून दाबल्याची चर्चा आहे. तो पुण्यातील टोळ्यांच्या संपर्कात असल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या संग्राम ताटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कुटुंबाने केली आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करू प्रत्येक व्यक्तीची चौकशी होईल. आरोपींनी सुरुवातीला खोटे जबाब देऊन दिशाभूल केली, पण आता तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हत्येच्या मुळापर्यंत पोहोचू. -प्रवीण पवार, पोलिस आयुक्त. पीआयवर कारवाईसाठी नातेवाइकांचा ठिय्या ‘दिव्य मराठी’ने गेवराई तांडा येथे केलेल्या पाहणीत माहिती समोर आली. या भागात सक्रिय असलेल्या रॅकेटमध्ये हर्सूलमधील काही तरुण आणि एका ब्यूटी पार्लर चालक महिलेचा समावेश आहे. लोंढे यांचे वैयक्तिक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन या टोळीने त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याची चर्चा आहे. याच पैशातून विशालने मौजमजा सुरू केली होती. विशेष म्हणजे, संशयित महिला ‘रीलस्टार’ असून तिचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे व्हिडिओदेखील चर्चेत आहेत. दिव्य मराठी ॲनालिसिसशवविच्छेदनानंतर लोंढे यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. उस्मानपुरा ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताटे यांनी दीड महिना तक्रारीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप लोंढे यांचे बंधू उत्तम लोंढे यांनी केला आहे. जोपर्यंत ताटे यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली होती. अखेर पोलिस आयुक्त पवार यांच्या मध्यस्थीनंतर मृतदेह ताब्यात घेऊन बार्शीकडे रवाना करण्यात आला.
शहरातील उद्योग सध्या गॅसटंचाईच्या संकटात सापडले आहेत. शहरातून वर्षाकाठी सुमारे २५ ते २७ हजार कोटी रुपयांची मोठी निर्यात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उद्भवलेल्या तीव्र गॅसटंचाईमुळे या निर्यातीवर कुऱ्हाड कोसळली आहे. विशेषतः ऑटोमोबाइल क्षेत्रातील स्थानिक उत्पादन साखळी विस्कळीत झाल्याने परदेशात जाणारी शिपमेंट आता १५-१५ दिवस उशिराने जात आहे. सीएमआयने केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गॅसप्रश्नी तोडगा काढण्यासाठी उद्योजक केंद्रीय मंत्र्यांना भेटणार एलएनजी आणि एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होऊन उद्योगांना फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर सीएमआयए आणि मसिआच्या शिष्टमंडळाने खासदार डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन निवेदन दिले. उद्योगांच्या गॅस समस्यांवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यासोबत तातडीने बैठक आयोजित करण्याची विनंती या वेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात उत्सव माछर, अथर्वेशराज नंदावत, मिहिर सौंदलगीकर आणि राहुल मोगले यांचा समावेश होता. गल्फ देशांची निर्यात संकटात सीएमआयच्या एक्स्पोर्ट ट्रेडचे अध्यक्ष ऋषिकेश जाजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातून गल्फ देशांमध्ये साधारण १ हजार कोटींची निर्यात होते. ही निर्यात छत्रपती संभाजीनगरमधून ज्या प्रमुख पाच देशांत होते त्यात चौथ्या क्रमांकावर आहे. गॅसटंचाईमुळे सध्या ही सर्व शिपमेंट रखडली आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर शिपिंग दरातही मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीला १३०० ते १५०० युरो असलेले कंटेनर भाडे आता थेट २५०० ते ३००० युरोपर्यंत पोहोचले आहे. यामुळे उत्पादनाच्या किमतीवरही परिणाम होत असून जागतिक बाजारात उद्योजकांना स्पर्धा करणे कठीण जात आहे. कंत्राटी कामगारांचे रोजगार धोक्यात उत्पादन कमी झाल्याचा थेट फटका आता कामगारांना बसू लागला आहे. भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस प्रभाकर मते यांनी सांगितले की, “कंपन्यांनी तीन शिफ्टऐवजी दोन किंवा एकाच शिफ्टमध्ये काम सुरू केल्याने कंत्राटी कामगारांना कमी केले जात आहे. शासनाने तत्काळ गॅस उपलब्ध करून न दिल्यास कंपन्यांमध्ये ले-ऑफ(कामगार कपात) सुरू होण्याची भीती आहे. २४ तासांच्या शिफ्ट आता काही तासांवर कंपन्यांमधील हीट ट्रीटमेंटसारख्या प्रक्रिया गॅसअभावी मंदावल्या आहेत. वाळूज, शेंद्रा आणि चिकलठाणा एमआयडीसीमधील अनेक उद्योजकांनी प्रोसेस प्लँट शिफ्टमध्ये चालवणे सुरू केले आहे. कच्चे साहित्य उपलब्ध असूनही केवळ इंधनाअभावी पक्का माल तयार होण्यास विलंब होत आहे. उद्योजक मिहिर सौंदलगीकर म्हणाले की, आम्ही सध्या केवळ गॅस कधी मिळतोय याची वाट पाहत आहोत. पुढील तीन दिवसांत ही समस्या सुटली नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल. लोकल सेक्टर विस्कळीत लोकल सेक्टरमधील उत्पादन विस्कळीत झाल्याचा परिणाम थेट निर्यातीवर आणि किमतींवर होत आहे. उत्पादन साखळी तुटल्याने उद्योगांचे मोठे नुकसान होत आहे. -सुनील किर्दक (माजी अध्यक्ष, सीआयआय मराठवाडा) बाहेरील मालावर परिणाम गॅस नसल्यामुळे छोटे उद्योग सर्वाधिक अडचणीत आहेत. गुजरात आणि चेन्नईला पाठवण्यात येणाऱ्या मालावरही परिणाम झाला आहे. समस्या युद्धपातळीवर सोडवावी. - अर्जुन गायकवाड (अध्यक्ष, मसिआ)
राज्यातील बोगस डॉक्टर आणि अनधिकृत नर्सिंग होमवर कडक कारवाई करण्यासाठी राज्य सरकार लवकरच विशेष टास्क फोर्स स्थापन करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. सध्याच्या कायद्यात फक्त ५० रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद असल्याने कठोर कारवाई करण्यासाठी नवे कडक धोरण आणले जाईल, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. भाजप आमदार चित्रा वाघ यांनी राज्यातील विशेषतः मुंबईतील अनधिकृत खासगी रुग्णालये व नर्सिंग होम्सचा प्रश्न परिषदेत उपस्थित केला. अनेक ठिकाणी नोंदणी नसलेली रुग्णालये सुरू असून त्या ठिकाणी रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. काही प्रकरणांत दहावी पास व्यक्ती स्वतःला डॉक्टर म्हणून काम करत असल्याचेही समोर आल्याचे त्यांनी नमूद केले. बोगस डॉक्टरांविरोधात विशेष मोहीम राबवावी, डॉक्टरांची ऑनलाइन यादी जाहीर करावी तसेच तक्रारींसाठी हेल्पलाइन व मोबाइल अॅप सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, काँग्रेसचे सदस्य भाई जगताप आणि सचिन अहिर यांनीही राज्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत तातडीने टास्कफोर्स स्थापन करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, राज्यातील अनधिकृत रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, संबंधित विभागीय आयुक्त तसेच वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी सहभागी असतील. ही समिती परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील अधिवेशनात अहवाल सादर करेल, असेही ते म्हणाले. बनावट लेटरहेडवर पास विक्रीचा घोटाळा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) नावाने बनावट लेटरहेड तयार करून त्यावर स्कॅन केलेल्या सह्यांच्या आधारे विधानभवनाचे पास मिळवून ते दोन ते पाच हजार रुपयांना विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात विधिमंडळातील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधान परिषदेत केला. एमआयडीसीच्या नावाने बनावट लेटरहेड तयार करून त्यावर विभागातील सुमारे ५० जणांची नावे व पदे नमूद करण्यात आली होती. या पत्राखाली सह-मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बनावट सही असल्याचे ते म्हणाले. तज्ज्ञ म्हणतात, कठोर कायदा हवाय बोगस डॉक्टरांकडून होणारे उपचार हा केवळ फसवणुकीचा प्रकार नसून तो गरिबांच्या जिवाशी चाललेला खेळ आहे. हे रोखण्यासाठी प्रशासनाने ‘क्यूआर कोड’ आधारित पारदर्शक पडताळणी यंत्रणा राबवणे आवश्यक आहे. बोगसगिरीला केवळ फसवणूक न मानता ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ मानून अजामीनपात्र गुन्हे दाखल व्हावेत. कायद्यातील ५० रुपयांचा दंड रद्द करून तो किमान ५ ते १० लाख रुपये आणि शिक्षा ७ वर्षे सक्तमजुरी केल्यासच आरोग्य व्यवस्थेत धाक निर्माण होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. मुंबईत १३७१ नर्सिंग होम नोंदणीकृत महाराष्ट्र शुश्रूषा नोंदणी अधिनियम, १९४९ अंतर्गत खाजगी रुग्णालये व नर्सिंग होम्सची नोंदणी व तपासणी केली जाते. विनानोंदणी सुरू असलेल्या रुग्णालयांना मुंबई महानगरपालिकेमार्फत नोटिसा बजावून ती बंद करण्याचे निर्देश दिले जातात. तसेच संबंधित रुग्णालयांची माहिती सर्व पोलिस ठाण्यांना देऊन दंडात्मक कारवाईही केली जाते. मुंबईत सध्या १३७१ नर्सिंग होम नोंदणीकृत असून गोवंडी, घाटकोपर आणि कुर्ला परिसरातील ३५ अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाई करण्यात आल्याची माहितीही त्यांनी या वेळी बोलताना दिली.
राज्यात २० मार्चपर्यंत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. १८ मार्च रोजी विदर्भातील ६ जिल्ह्यांतगारपिटीची शक्यता असून, यंदाच्या गुढीपाडव्याला मराठवाड्यात पावसाचे सावट राहील. दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. कमाल तापमानात सरासरी १ ते २ अंश सेल्सिअसने घट नोंदवण्यात आली असून नाशिकचे तापमान ३४.१ अंशांवर स्थिरावले आहे. पावसाचा अंदाज असला तरी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांसह मुंबई, ठाणे आणि संभाजीनगर परिसरात उष्णता आणि रात्रीचा उकाडा कायम राहील. दिवसा ढगाळ हवामान आणि रात्री वाढलेले किमान तापमान याचा आरोग्यावरही परिणाम होईल. १८ मार्च : अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया येथे गारपीट. पावसाचा प्रभाव : अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव, लातूर, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर पश्चिमी चक्रवातामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाचा अनुभव हिमालयातील पश्चिमी चक्रवातामुळे निर्माण झालेल्या या स्थितीमुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पावसाचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्रासह पंजाब, आसाम, तेलंगणा या राज्यातही पावसाचा अंदाज आहे. माणिकराव खुळे, निवृत्त शास्त्रज्ञ, पुणे हवामान विभाग
धर्मस्वातंत्र्य विधेयकाला उद्धवसेनेने पाठिंबा दिला आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात कलगीतुरा रंगला. उद्धव ठाकरेंनी तत्त्वतः पाठिंबा जाहीर करतानाच सरकारला काही थेट सवाल विचारले. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर मतांच्या लांगूलचालनाचा आरोप करत या विषयावर राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी या विधेयकावर विधानसभेत चर्चा झाली. त्याआधी सभागृहाबाहेर उद्धव ठाकरे म्हणाले की, फसवणूक, आमिष किंवा सक्तीने होणाऱ्या धर्मांतराला आमचा ठाम विरोध आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत अशा घटना वाढल्या असतील, तर हे केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारचे अपयश नाही का? ईडी, सीबीआय आणि ‘खोक्यां’च्या माध्यमातून होणारे राजकीय धर्मांतर थांबवणार का? त्यावर फडणवीस म्हणाले की, हे विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. तामिळनाडूसारख्या बिगर भाजपशासित राज्यांनीही असे कायदे केले आहेत. मुलींना फूस लावून पळवून न्यायचं, लग्न करायचं, नंतर सोडून द्यायचं, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्याला कायद्याचा चाप लागणार आहे. उद्धव ठाकरेंपुढे पर्याय नाही सूत्रांनी सांगितले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांनी उद्धवसेनेला भरघोस मतदान केले. तेव्हापासून उद्धव ठाकरे मुस्लिमांकडे झुकले. मात्र, विधानसभा आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीत मुस्लिमांची अपेक्षित एकगठ्ठा मते त्यांना मिळाली नाहीत. त्यामुळे हिंदूंची मते िटकवून ठेवण्यासाठी विधेयकाला पाठिंबा देण्याशिवाय उद्धव ठाकरेंपुढे दुसरा पर्याय नाही. दुसरीकडे मुस्लिम मतांची आशा आणि दबाव असल्याने ते विधेयकावर काहीतरी विरोधात बोलायचे म्हणून ईडी, सीबीआय तसेच खोक्यांचे धर्मांतरण असे मुद्दे काढत आहेत. वादग्रस्त वक्तव्याने गदारोळ;आव्हाडांनी मागितली माफी विधेयकावर बोलताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे गदारोळ झाला. त्यांच्या निलंबनाची मागणी मंत्री नीलेश राणेंनी केली. मंत्री भुसे यांनीही आव्हाडांवर टीका केली. सभागृहाचे कामकाज दहा मिनिटे तहकूब करण्यात आले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशावरून आव्हाडांनी माफी मागितली.
विधान परिषदेत वाद:‘गद्दारी’वरून खडाजंगी; अनिल परब-उदय सामंत आमनेसामने, सभागृहात तणावाचे वातावरण
मुंबई महानगरपालिकेच्या थकीत निधीच्या मुद्द्यावरून सोमवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाक्युद्ध पाहायला मिळाले. शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी शिंदे गटावर “गद्दारी’चा आरोप करत निशाणा साधला, तर मंत्री उदय सामंत यांनी “खिचडी घोटाळा’ आणि “कोविड भ्रष्टाचारा’ची आठवण करून देत त्यांना जशास तसे उत्तर दिले. या शाब्दिक चकमकीमुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई महानगरपालिकेला राज्य सरकारकडून सुमारे १०,९४८ कोटी रुपये येणे बाकी असल्याचा प्रश्न आमदार सुनील शिंदे यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, तांत्रिक कारणांमुळे हा आकडा फुगलेला दिसत आहे. शिक्षण विभागाचे ५,६६५ कोटी नव्हे, तर केवळ २०० कोटी रुपये देणे बाकी आहे. तफावत दूर करण्यासाठी महापालिका आयुक्तांना तातडीने निर्देश दिले जातील, असेही त्यांनी सांगितले. गद्दारीची किंमत विरुद्ध खिचडी घोटाळा या चर्चेदरम्यान अनिल परब आक्रमक झाले. एकीकडे पालिकेचा निधी थकीत आहे आणि दुसरीकडे सत्ताधारी आमदारांना १६०० कोटी रुपये वाटले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. उबाठा गटाकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न गेली २५ वर्षे ठाकरेंचे सत्ताकेंद्र असलेल्या मुंबई मनपावर शिंदेंनी भाजपच्या मदतीने सत्ता मिळवली आहे. त्यामुळे ठाकरेसेनेत प्रचंड खदखद आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. पालिकेचा निधी अडवून सरकार मुंबईला कमकुवत करत आहे, हा नॅरेटिव्ह सेट करून मराठी अस्मितेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात असल्याचे दिसून येते. ठाकरे गटाकडून गद्दारीवरून डिवचण्याचा प्रयत्न सुरूच आहे. एकूणच शिंदेसेना आणि ठाकरेसेना यांच्यातील संघर्षची ठिणगी कायमच दिसून येते.
भुजबळांची माहिती, गॅस तुटवड्यावर केरोसीनची मात्रा मुंबई : प्रतिनिधी राज्यात घरगुती गॅसच्या टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून बाजारात मोठ्या प्रमाणावर रॉकेल उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच पेट्रोल पंपांवर रॉकेल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदनाद्वारे दिली. […] The post पेट्रोल पंपांवर रॉकेल मिळणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यसभेत विरोधक आक्रमक, सरकारला धरले धारेवर नवी दिल्ली : वृत्तसंस्था अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या टप्प्यात सोमवारी लोकसभेत पहिल्यांदाच प्रश्नकाळ कोणत्याही गदारोळाशिवाय पूर्ण झाला. इकडे राज्यसभेत एलपीजी सिलेंडरच्या संकटावरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत सांगितले की, पेट्रोलियम मंत्र्यांनी लोकसभेत दावा केला की एलपीजीची कोणतीही कमतरता नाही. परंतु जमिनीवरील वास्तव सरकारी दाव्यांना खोटे […] The post गॅस तुटवड्यावरून गदारोळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना बळ
मुख्यमंत्री फडणवीस, राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आधुनिक उपाययोजनांचा प्रभावी वापर करण्यासाठी राज्य शासन आणि वाधवानी एआय या सामाजिक हेतूने कार्य करणा-या ना-नफा-ना-तोटा संस्थेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य […] The post कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना बळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बिहारमध्ये ५ जागांवर एनडीएचीच सरशी
नितीश कुमार राज्यसभेवर, ११ जागांसाठी निवडणूक नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यसभेच्या १० राज्यांमधील ३७ जागांपैकी २६ जागा आधीच बिनविरोध निवडून आल्या असून, हरियाणा, बिहार आणि ओडिशामधील ११ जागांसाठी आज मतदान झाले. त्यानंतर निकालही जाहीर झाला असून, बिहारमधील सर्व पाचही राज्यसभेच्या जागांवर एनडीएने विजय मिळवल. या विजयासह मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप अध्यक्ष नितीन नबीन राज्यसभेत […] The post बिहारमध्ये ५ जागांवर एनडीएचीच सरशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ट्रम्पना मित्र राष्ट्रांचा ठेंगा
होर्मूझ सामुद्रध्वनीत युद्धनौका पाठविण्यास नकार चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, द. कोरिया, यूके, फ्रान्सचा इन्कार वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध १७ व्या दिवशी सुरु होते. इराणने युद्ध सुरु झाल्यानंतर होर्मूझच्या सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, यूके आणि फ्रान्सला युद्धनौका होर्मूझच्या सामुद्रधुनीत पाठवण्याचे […] The post ट्रम्पना मित्र राष्ट्रांचा ठेंगा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती येथील मूळ रहिवासी आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) संचालक किशोर रिठे यांच्या 'सातपुड्याचा सातबारा' या पुस्तकाला सर्वोत्तम संशोधनात्मक पुस्तक श्रेणीतील साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. निसर्ग व वन्यजीव क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक म्हणून रिठे परिचित आहेत. रिठे यांनी संपूर्ण सातपुडा पर्वतराजीत तब्बल ३५ वर्षे वने व वन्यजीव संरक्षणाचे कार्य केले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवावर आधारित 'सातपुड्याचा सातबारा' हा ६४७ पानांचा ग्रंथ नुकताच पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. हे त्यांचे चौथे पुस्तक असून, यापूर्वी त्यांनी 'रानावनाचे मूडस', 'हिरवा संघर्ष' (मराठीत) आणि 'सातपुडा' (इंग्रजीत) ही पुस्तके लिहिली आहेत. राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय निवड समितीने या पुस्तकाची सर्वोत्तम संशोधनात्मक पुस्तक म्हणून निवड केली. या पुरस्कारांचे वितरण आगामी २४ मार्च रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहात एका विशेष समारंभात करण्यात येणार आहे. पुरस्काराची घोषणा होताच, पद्मगंधा प्रकाशन, महाराष्ट्र पक्षिमित्र, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, सातपुडा फाउंडेशन, निसर्ग संरक्षण संस्था अमरावती तसेच महाराष्ट्रातील पर्यावरण विषयक कार्यरत अनेक संघटनांच्या सदस्यांनी किशोर रिठे यांचे अभिनंदन केले आहे.
डॉ. हेडगेवार हॉस्पिटलने 178 विद्यार्थ्यांची केली तपासणी:वीर वामनराव जोशी शाळेत मोफत आरोग्य शिबिर
जनकल्याण सेवा संस्था संचालित डॉ. हेडगेवार हॉस्पिटलने वीर वामनराव जोशी शाळेतील १७८ विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले. हे दोन दिवसीय शिबिर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित शाळेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी होते. बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा बनसोड आणि डॉ. वसुंधरा घोडेस्वार यांनी या शिबिरात १७८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये विद्यार्थ्यांचे वजन आणि उंची मोजण्यात आली. मुख्याध्यापक दिलीप सदार आणि शिक्षकांनी शिबिराचे नियोजन केले होते. यावेळी उपस्थित पालकांनी डॉ. बनसोड यांच्याशी संवाद साधून आरोग्याशी संबंधित प्रश्न विचारले आणि त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. डॉ. हेडगेवार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या रुग्ण तपासणी, भरती उपचार आणि विविध शस्त्रक्रियांबद्दलची माहितीही उपस्थित विश्वस्त, शिक्षक आणि पालकांना देण्यात आली. शिबिराच्या सुरुवातीला शाळेतर्फे डॉ. बनसोड आणि त्यांच्या चमूचे स्वागत करण्यात आले. जनकल्याण सेवा संस्थेचे सदस्य अरुण बांबल यांनी शिबिराला भेट देऊन समाधान व्यक्त केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी वैभव इंगळे, मयुरी चौधरी, नांदापुरे, आकाश काळे, अनिता कुलकर्णी, मोनिका पाटील, ज्योती मडावी, सुजित खोजरे, आसावरी सोवळे, सचिन वंदे, मनिषा श्रीराव, विलास देणे, अमोल पाचपोर आणि चित्राताई यांनी सहकार्य केले.
माहुली चोर येथे भागवत सप्ताहाचे आयोजन:42 वर्षांपासून अखंड परंपरा; गावात आध्यात्मिक वातावरण
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर येथील विठ्ठल मंदिरात दरवर्षी भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षी सप्ताहाचे हे ४२ वे वर्ष असून, ह.भ.प. शिवाजी महाराज मानकर यांच्यासह अनेक महाराजांनी कीर्तन-प्रवचन केले. यामुळे संपूर्ण गावात आनंदी आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. या सप्ताहाचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये आध्यात्मिक भाव, राष्ट्रीयता आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे हा आहे. या शिबिरामुळे समाजाला मोठी उपयोगिता मिळते. सप्ताहाचे एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये लहान मुलांना हरिपाठाचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यात गावातील अनेक मुला-मुलींचा सहभाग असतो. यावर्षीच्या प्रवचनात ह.भ.प. मुकेश महाराज आखरे, ह.भ.प. विष्णू महाराज अढावु, ह.भ.प. शिवाजी महाराज झामरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाघ, ह.भ.प. रामभाऊ महाराज उन्हाळे, ह.भ.प. प्रशांत महाराज ताकोते आणि ह.भ.प. विष्णू महाराज गावंडे यांनी कीर्तनाची सेवा दिली. त्याचबरोबर, सोपान महाराज शेलार, सतीश महाराज कुळकर्णी, विष्णू महाराज गावंडे, विशाल महाराज मालगे, गौरव महाराज देठे, ऋत्वीक गुल्हाने, महेश चव्हाण, तन्मय गुल्हाने आणि सोहम जाधव यांनी गायन व वादनाची सेवा दिली. सप्ताहादरम्यान महाराजांच्या भोजनाची व्यवस्था दररोज एका घरी केली जाते. यामध्ये सुधाकरराव जाधव, जनार्दन चव्हाण, मुरलीधर ढगे, रविंद्र भागवत, गोपाळराव सरोदे, किसनराव जुंजारे, प्रभाकर कोळसेकर, प्रमोद दाते, बाळु जाधव, चंद्रशेखर भागवत, प्रमोद चाफले, राजेंद्र कोकाटे, प्रकाशराव तिखीले, बंडू जाधव, विनायकराव तिखीले, ज्ञानेश्वरराव गायकवाड, कुमार न्याहाल, रामेश्वर ताठे, गणेश खवड आणि सुधाकरराव तिखीले यांनी सहभाग घेतला.
वर्धेचे खासदार अमर काळे यांनी मोर्शी येथील नळा नदीवरील अर्धवट पुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्याची आणि निंभी येथील टोलनाका रद्द करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना त्यांनी या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. नांदगाव पेठ ते पांढुर्णा या रस्त्याचे बांधकाम तीन वर्षांपासून पूर्ण झाले असले तरी, नळा नदीवरील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, पूल केवळ एका बाजूने पूर्ण करण्यात आला आहे, तर दुसरी बाजू अर्धवट स्थितीत आहे. पुलाजवळच तीर्थक्षेत्र सालबर्डीकडे जाणारा मार्ग असल्याने येथे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. वरूडवरून अमरावतीकडे जाणाऱ्या वाहनांना हा अर्धवट पूल स्पष्ट दिसत नाही, ज्यामुळे अनेक अपघात घडले आहेत. यापूर्वी धान्य घेऊन जाणारा एक आयशर ट्रक आणि वरूड-मोर्शी मार्गे चांदूरबाजार जाणारी एक कार याच ठिकाणी उलटली होती. बाराही महिने सालबर्डी येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते आणि येथूनच वळण रस्ता असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. याचबरोबर, नांदगाव-मोर्शी-वरुड-पांढुर्णा या राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे आणि अपूर्ण असतानाही मोर्शी-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर निंभी येथे टोल नाका सुरू करण्यात आला आहे. मोर्शी आणि वरुड तालुक्यातील अनेक नागरिक अमरावतीला ये-जा करतात. त्यांना नांदगाव पेठ येथील टोल नाक्यावर आधीच टोल द्यावा लागतो. आता निंभी येथेही टोल आकारणी करून वाहनधारकांची सर्रास लूट केली जात असल्याचा आरोप खासदार काळे यांनी केला आहे. त्यांनी याकडेही केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी हात उंचावून निवडणूक प्रक्रीया पार पडल्याने महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी ५९ पैकी भाजपाच्या उषा संभाजी पाटील यांना ३४, काँग्रेसच्या दिपाली शामराव भोसले यांना २५, तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दयानंद दामोदर सुरवसे यांना ३४ मते पडली. तर काँग्रेसच्या नागेश्वरी सचिन केंद्रे यांना २५ […] The post लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एक तरुण ठार तर अन्य दोघे जण गंभीर जखमी
चाकूर : प्रतिनिधी फशहरातील तिहेरी अपघातात एका तरुण ठार तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयासमोरील मोठ्या रस्त्यावर दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर जोरदार धडक झाली होती. त्यात एका दुचाकीवरून एक युवक रस्त्यावर कोसळला होता. त्याच्या डोक्यावरून पाठीमागून येणारा मोठा बांधकाम मिक्सर वाहन गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता. […] The post एक तरुण ठार तर अन्य दोघे जण गंभीर जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
घटस्फोटासाठी आलेले दाम्पत्य पुन्हा एकत्र:अमरावती लोकअदालतीत समुपदेशनाने वाचला संसार
अमरावती येथील लोकअदालतीत घटस्फोटासाठी आलेले एक दाम्पत्य समुपदेशनानंतर पुन्हा एकत्र परतले. त्यांच्यातील मतभेद मिटवून त्यांनी सहजीवनाचा मार्ग पुन्हा स्वीकारला, ज्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. शनिवारी येथील कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत आपसी संमतीने घटस्फोटासाठी दाखल झालेले ग्रामीण भागातील एका पती-पत्नीचे प्रकरण सुनावणीसाठी आले होते. या प्रकरणाचा न्यायालयीन प्रवास काही काळापूर्वी सुरू झाला होता. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश शेळके यांच्यासमोर हे प्रकरण ठेवण्यात आले होते. सुरुवातीला दोघांनीही आपसी संमतीने घटस्फोटाची मागणी केली होती. मात्र, कौटुंबिक न्यायालयाचे समन्वयक, न्यायाधीश आणि दोन्ही बाजूंच्या वकिलांनी हे कुटुंब तुटू नये यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी पती-पत्नी दोघांचीही योग्य समजूत घातली. भविष्यातील दुष्परिणाम, विशेषतः त्यांच्या मुलांवर होणारे परिणाम याबद्दल त्यांना मार्गदर्शन केले. या समुपदेशनामुळे दोघांनीही आपली घटस्फोटाची मागणी मागे घेतली. त्यांनी काही कारणास्तव रखडलेला सहजीवनाचा मार्ग पुन्हा एकदा स्वीकारला. कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शेळके आणि पॅनल ऑफ ॲडव्होकेटस् समोर त्यांनी स्वतःच ही बाब स्पष्ट केली. या निर्णयानंतर दाम्पत्याने सांगितले की, आम्ही आमच्या लहान मुलाचा आणि आमच्या संसाराचा विचार करून आपसी सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय रद्द केला आहे. मागील तीन महिन्यांपासून ॲड. चंद्रशेखर डोरले, ॲड. सुयश डोरले, ॲड. प्रथमेश गणेशकर आणि ॲड. निसार खान या वकिलांनी दिलेले सल्ले त्यांना पटले असल्याचे त्यांनी नमूद केले. अशाप्रकारे, संपुष्टात येण्याच्या मार्गावर असलेला त्यांचा संसार लोकअदालतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू झाला.
वि.सा.संघ निवडणुकीत अमरावतीतून चार उमेदवार:निकालाची प्रतीक्षा, मतमोजणी अद्याप सुरू
विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील चार साहित्यिक सदस्यपदासाठी निवडणूक लढवत आहेत. अध्यक्षपदाचा निकाल लागला असला तरी, सदस्यपदाची मतमोजणी अद्याप सुरू असल्याने निकालाबाबत साहित्यिकांमध्ये उत्सुकता आहे. नागपूर येथील मुख्यालयात मतमोजणी सुरू आहे. अमरावतीतून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रा. डॉ. शोभा रोकडे (गिरीश गांधी पॅनल), प्रा. सतीश तराळ (प्रा. प्रदीप दाते पॅनल), प्रा. डॉ. मोना चिमोटे (प्रा. प्रदीप दाते पॅनल) आणि कवी विष्णू सोळंके (प्रा. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी पॅनल) यांचा समावेश आहे. शंभर वर्षांपूर्वी अमरावतीत स्थापन झालेल्या विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीसाठी मतपत्रिका स्वीकारण्याची अंतिम तारीख १४ मार्च होती. त्यानंतर, १५ मार्चपासून नागपूर येथील वि.सा. संघाच्या मुख्यालयात मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीला अध्यक्षपदाची मतमोजणी झाली, त्यानंतर सदस्यपदांसाठीची मतमोजणी सुरू झाली, जी रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे. ही निवडणूक एका अध्यक्षपदासाठी आणि २२ सदस्यपदांसाठी घेण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात होते, ज्यात गिरीश गांधी सुमारे १८०० मतांच्या फरकाने विजयी झाले. सदस्यपदासाठी एकूण ८३ उमेदवार मैदानात आहेत. एकूण ४,९३६ मतदान झाले असून, एका फेरीत ६०० मतांची मोजणी केली जात आहे. यामुळे रात्री उशिरापर्यंत अंतिम निकाल अपेक्षित आहे.
जळगाव जिल्ह्याचे रहिवासी असलेले अजिंक्य पाटील हे डी. ई. शॉ. या बहुराष्ट्रीय समूहाचा भाग असलेल्या हैदराबाद येथील आर्सेसियम (Arcesium) या जागतिक फिनटेक कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. ते आणि त्यांचे सहकारी अनुप हे हैदराबादहून अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे कंपनीच्या कामानिमित्त प्रवास करत असताना अचानक उद्भवलेल्या आंतरराष्ट्रीय तणावामुळे त्यांचा प्रवास थांबवावा लागला. 28 फेब्रुवारी 2026 रोजी कुवेत विमानतळावरून न्यूयॉर्ककडे उड्डाण केल्यानंतर त्यांचे विमान इराकच्या सीमेवर पोहोचत असतानाच इराण–अमेरिका–इझ्रायल संघर्ष तीव्र झाला. त्यामुळे इराकच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATS) कडून त्या हवाई क्षेत्रात विमानांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आणि विमानाला पुन्हा कुवेत सिटी येथे वळवावे लागले. विमानात त्या वेळी सुमारे 15 तासांचा इंधनसाठा असल्याने सुरक्षित लँडिंगसाठी वैमानिकांना हवेतच इंधन कमी करावे लागले. त्यानंतर विमानाचे कुवेत येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्यामुळे अजिंक्य पाटील यांच्यासह सुमारे 300 प्रवासी 7 मार्च 2026 पर्यंत कुवेतमध्ये अडकून पडले. दरम्यान, विमानतळाच्या टर्मिनलमध्ये प्रवासी थांबलेले असतानाच परिसरात इराणकडून ड्रोन हल्ले झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. या परिस्थितीत कुवेत एअरवेज आणि स्थानिक प्रशासनाने तत्परता दाखवत 300 हून अधिक प्रवाशांना सुरक्षितपणे शहरातील हॉटेलमध्ये हलवले. हॉटेलच्या खिडकीतून त्यांना अमेरिकन दूतावास परिसरातील हल्ल्यांची परिस्थितीही दिसत होती. व्यावसायिक निष्ठा आणि त्याग बाहेर युद्धजन्य परिस्थिती असतानाही अजिंक्य पाटील यांनी आपली व्यावसायिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. त्यांनी हॉटेलमधूनच ‘लिमिना’ (Limina) या कंपनीच्या विलीनीकरणासंदर्भातील महत्त्वाच्या बैठका न्यूयॉर्क आणि स्वीडनमधील सहकाऱ्यांसोबत ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केल्या. दरम्यान, स्वतः सुरक्षित बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही त्यांनी आपल्या सोबत अडकलेल्या भारतीय प्रवाशांना आधी सुरक्षित बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. बचाव मोहिमेचे नियोजन कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीय प्रवाशांशी संवाद साधून अजिंक्य पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्या काळात प्रवाशांना धीर देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी नियोजन करणे हे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधत प्रवाशांना बसने सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे नेण्याचे नियोजन करण्यात आले. सुमारे 700 किलोमीटरचा प्रवास करून सर्व प्रवासी सुरक्षितपणे रियाध येथे पोहोचले. चार्टर विमानाने मुंबईत आगमन रियाध येथे पोहोचल्यानंतर पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. तेथून ‘फ्लायनास एअरवेज’ (Flynas Airways) च्या चार्टर विमानाद्वारे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे मुंबई येथे आणण्यात आले. या संपूर्ण बचाव मोहिमेमुळे युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या शेकडो भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी परतता आले. अजिंक्य पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या धाडसी पुढाकारामुळे अनेक भारतीय प्रवाशी सुखरूप मायदेशी भारतात परतले. संकटाच्या काळात त्यांनी दाखवलेले नेतृत्व, धैर्य आणि मानवतावादी दृष्टिकोन याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साताऱ्यात पंचायत समितीच्या निवडणुका पार:भाजपा-राष्ट्रवादीला प्रत्येकी 5, तर शिवसेनेला 1 सभापतीपद
सातारा जिल्ह्यातील ११ पंचायत समितींच्या सभापती निवडी सोमवारी पार पडल्या. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी ५ आणि शिवसेनेला १ सभापतीपद मिळाले. फलटणमध्ये निवडीपुर्वीच राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांनी भाजपामध्ये प्रवेश करत खळबळ उडवून दिली. त्यानंतर भाजपाचा सभापती आणि शिवसेनेचा उपसभापती झाला. माण पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ईश्वर चिठ्ठीची साथ मिळाली. त्यामुळे भाजप नेते जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसला आहे. कराड पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपाचा भगवा फडकला आहे. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक नाट्यमय घडामोडी फलटणमध्ये पाहायला मिळाल्या. भाजपाच्या शिवांजली भोसले यांची सभापतीपदी आणि शिवसेनेच्या अमोल सस्ते यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. निवडीच्या आधी नवनिर्वाचित सभापतीसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी दोन सदस्यांनी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश केल्याने हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आता पक्षात काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. फलटणचे आमदार सचिन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले तरी मूळचे ते माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे कट्टर समर्थक आहेत. पंचायत समितीचे सभापतीपद राष्ट्रवादीला मिळत असतानाही त्यांनी ती संधी दवडली. दुसरीकडे रणजितसिंह निंबाळकरांनी सभापती भाजपाचा करून मास्टरस्ट्रोक खेळला आहे. या घडामोडींनंतर आता आमदार सचिन कांबळे-पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कारवाई करणार का? हे पाहावे लागेल. अनेक दशके कॉंग्रेसची आणि २००४ नंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता राहिलेल्या कराड पंचायत समितीवर भाजपाने आपला झेंडा रोवला आहे. सभापती आणि उपसभापतीपदी भाजपने महिलांना संधी दिली आहे. कराड दक्षिण आणि उत्तरमध्ये १३ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले होते. पदाधिकारी निवडीत नाट्यमय घडामोडी घडतील, असे चित्र होते. मात्र, भाजपच्या दोन्ही आमदारांनी जुळवून घेतल्याने सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक भाजपने जिंकली. कराड दक्षिणेतील नंदा यादव यांना सभापती आणि कराड उत्तरमधील अनिता वेताळ यांना उपसभापतीपदावर संधी मिळाली. माण - राष्ट्रवादी, खटाव - भाजप, फलटण - भाजप, कोरेगाव - राष्ट्रवादी, सातारा - भाजप, वाई - राष्ट्रवादी, जावली - भाजप, कराड - भाजप, खंडाळा - राष्ट्रवादी, महाबळेश्वर - राष्ट्रवादी, पाटण - शिवसेना
बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणावर घाला
लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्याकडून दि. १ जानेवारी २०२६ रोजी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांनी निर्गमित करण्यात आलेले परिपत्रक म्हणजे श्रमिक बांधकाम कामगारांच्या पोटावर लाथ मारणारा, त्यांच्या मुलांचे शिक्षण उध्वस्त करणारा आणि थेट भारतीय संविधानावर घाला घालणारा काळा निर्णय असल्याची घणाघाती टीका सामाजिक […] The post बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणावर घाला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉ. नीलम गोऱ्हे यांची लोणीकंद हुंडाबळी प्रकरणाची दखल:पुणे पोलिस आयुक्तांना कठोर कारवाईसाठी निवेदन
विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथील विवाहितेच्या कथित हुंडाबळी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मृत विवाहिता वैष्णवी यशवंत लाटे हिच्या प्रकरणात आरोपींवर कठोर आणि तातडीने कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तांना निवेदनाद्वारे दिल्या आहेत. लोणीकंद पोलिस ठाण्यात या प्रकरणी १५ मार्च २०२६ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे. डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन निष्पक्ष आणि सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्या निवेदनात डॉ. गोऱ्हे यांनी वरिष्ठ व अनुभवी पोलिस अधिकाऱ्यांमार्फत प्रकरणाचा तपास करण्याची आणि संबंधित आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच, मृत विवाहिता वैष्णवीच्या कुटुंबाला आवश्यक ते संरक्षण व सहकार्य देण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. विवाहितेने कोणती सुसाईड नोट लिहिली आहे का, तिचे शेवटचे फोन संभाषण काय होते आणि छळासंदर्भातील सर्व बाबींची तपासात सखोल चौकशी करून आवश्यक पुरावे गोळा करावेत, असेही त्यांनी सुचवले आहे. या प्रकरणात आधुनिक फॉरेन्सिक तंत्रांचा वापर करून तपास अधिक प्रभावीपणे करावा, तसेच हुंड्याच्या मागणीसंदर्भातील वस्तू जप्त करून त्याबाबतचे पुरावे तपासात समाविष्ट करण्यावरही त्यांनी भर दिला आहे. तपास पूर्ण करून लवकरात लवकर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात यावे आणि हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी पोलिस प्रशासनाला केली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रशासनाने तातडीने आणि प्रभावी कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सर्व्हिस रोडवर भव्य मॉलची उभारणी
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाचा कारभार मोठ्या गमतीचा आहे. येथे कायद्याचे काहींच चालेना, अशी परिस्थिती आहे. अनाधिकृत ले-आऊट काटून रस्तेच गायब करण्याचे प्रकार घडत असतानाच आता सर्व्हिस रोडवरच भव्य मॉलची उभारणी होत असल्याचे दिसून येत आहे. हे कसे होते?, याला आशिर्वाद कोणाचे? हे प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत असले तरी या मागे महानगरपालिकेचे मोठे अधिकारी […] The post सर्व्हिस रोडवर भव्य मॉलची उभारणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाबाबत दिलेल्या एका संदर्भामुळे सभागृहात वादाचे वातावरण निर्माण झाले. इतिहासातील विविध दाखले देत असताना आव्हाड यांनी केलेल्या या विधानावर आक्षेप घेतला गेल्याने मोठा गदारोळ झाला. या पार्श्वभूमीवर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलगिरी व्यक्त करण्याचे निर्देश दिले, ज्याची तातडीने दखल घेत आव्हाड यांनी सभागृहाची माफी मागितली आणि या वादावर पडदा पडला. जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेत शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, दादा भुसे आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा स्वीकारला. शंभूराज देसाई यांनी आव्हाडांचे वक्तव्य विधिमंडळाच्या पटलावरून त्वरित काढून टाकण्याची मागणी केली. सत्ताधारी बाकांवरील आमदारांच्या या जोरदार घोषणाबाजीमुळे आणि वाढत्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आव्हाडांनी दिलगिरी व्यक्त केली, तरीही नितेश राणे, योगेश सागर आणि दादा भुसे यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. आमदारांची ही आक्रमक भूमिका आणि सभागृहातील तणाव कायम असल्याचे पाहून अध्यक्षांनी आव्हाडांना माफी मागण्यास सांगितले, ज्यानंतर त्यांनी सभागृहाची औपचारिक माफी मागितली आणि या वादावर पडदा पडला. धर्मस्वातंत्र्य विधेयकावर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? जितेंद्र आव्हाड म्हणाले, कलम 295, 410 या तरतुदी अस्तित्वात आहे. जबरदस्तीने धर्मांतराला सर्वांचाच विरोध आहे. कायद्यात डॉ. बाबासाहेबांनी धर्म स्वातंत्र्याचे अधिकार देऊन ठेवले आहेत. त्याच नावाने महाराष्ट्रात बिल आणणे म्हणजे मूळ कायद्याला छेद देणे आहे. पुढे ते म्हणाले, बुद्धाने धर्म का सोडला? गौतम बुद्ध यांनी केलेले धर्मांतरण देशातले पहिले धर्मांतरण. मग आजच्या कायद्याने त्यांनाही जेलमध्ये जावे लागले असते. महावीरांना जेलमध्ये घाला. बसवेश्वर यांना जेलमध्ये घाला. विद्रोह हा महाराष्ट्राचा कणा आहे.
ज्येष्ठ कवी आणि विडंबनकार रामदास फुटाणे यांनी मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. मातृभाषा आपल्याला जगण्याचे बळ देते, त्यामुळे ती टिकवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. कवी शशिकांत तिरोडकर यांच्या 'मिठी' नंतरच्या कविता या कवितासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे आणि साहित्यदीप प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर व्यासपीठावर उपस्थित होते. फुटाणे पुढे म्हणाले की, नाटक, चित्रपट, साहित्य आणि संगीत यांसारख्या विविध कला प्रकारांमधून भाषा समृद्ध होते. त्यामुळे त्या भाषेत सकस आणि कसदार कलाकृतींची निर्मिती होणे आवश्यक आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीपासून आपण दूर जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) आहारी जाण्यापासून वाचण्यासाठी वेळीच योग्य पावले उचलण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. यावेळी रामदास फुटाणे यांनी पुण्यावर आधारित एक कविता सादर केली, ज्याला उपस्थितांनी उत्तम दाद दिली. कवी अशोक नायगावकर यांनी आपल्या मनोगतात सध्या भाषा आणि कवितेचा होत असलेला ऱ्हास याबद्दल चिंता व्यक्त केली. कविता लोप पावत चालल्यामुळे जगण्यातला स्पर्श हरवला आहे, असे ते म्हणाले. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचे अभंग आजही अजरामर आहेत, कारण कवितेइतके चिरंतन जगात दुसरे काहीच नाही, असे नायगावकर यांनी नमूद केले. माणूस दिवसेंदिवस कोरडा होत चालला असून, कवितेपासून दूर जाणे म्हणजे जगण्यापासून दूर जाणे आहे, असे मत त्यांनी मांडले. कवितासंग्रहाचे कवी शशिकांत तिरोडकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ते कवितेचे दोनच प्रकार मानतात: एक अभिजनांची दुर्बोध वाटणारी कविता आणि दुसरी रसिकांशी बोलणारी सुबोध सुंदर कविता. खरी कविता तीच जी एकाचवेळी लाखो लोकांशी बोलते, असे ते म्हणाले. आपला जन्म निसर्गसंपन्न कोकणात झाल्यामुळे, कोकण म्हणजे 'परमेश्वराची अद्भुत रंगपेटी' असल्याने, निसर्गाचे विविध रंग आपल्या कवितांमध्ये येतात. त्यामुळे कविता झऱ्यासारखी सहज येते आणि रसिकांना सहज समजेल अशी लिहिली जाते, असे तिरोडकर यांनी स्पष्ट केले.
पुणे येथे 'शिक्षकांचे मानसिक आरोग्य व शालेय शिक्षण' या विषयावर पहिली राज्यस्तरीय परिषद उत्साहात पार पडली. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) महाराष्ट्र, पुणेच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी शिक्षकांनी स्वतःशी संवाद साधणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. आवटे म्हणाल्या की, शिक्षक विद्यार्थी, पालक आणि इतर घटकांशी संवाद साधतात, परंतु स्वतःशी संवाद साधणे तितकेच महत्त्वाचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्वतःचे मानसिक आरोग्य जपल्यास प्रभावी अध्ययन-अध्यापन शक्य होईल आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने जाता येईल. त्यांनी ताण-तणावांचे व्यवस्थापन करून मानसिक आरोग्य जपण्याचे आवाहन केले. वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन (वोपा) संस्थेच्या वतीने आणि नोसील लिमिटेड यांच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर वोपाचे संस्थापक प्रफुल्ल शशिकांत आणि शिक्षणतज्ज्ञ हेमा होनवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. वोपा संस्थेने शिक्षकांच्या मानसिक आरोग्यासाठी उचललेले हे पाऊल एक नवी सुरुवात असल्याचे डॉ. आवटे यांनी नमूद केले. वोपा संस्थेचे संस्थापक प्रफुल्ल शशिकांत यांनी सांगितले की, शिक्षकांवर विद्यार्थी घडवण्याची आणि राष्ट्रनिर्माणाची थेट जबाबदारी असते. गेल्या आठ वर्षांपासून वोपा संस्था शिक्षकांसोबत काम करत आहे. शिक्षकांवरील कामाचा वाढता ताण आणि विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजांमुळे त्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत मानसिक आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी चर्चा होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. या परिषदेत वोपा संस्थेने 'शिक्षकांचे मानसिक आरोग्य, त्याचा शिक्षण प्रक्रियेवर होणारा परिणाम' या विषयावर केलेल्या राज्यस्तरीय सर्वेक्षण अहवालाचे सादरीकरण वरिष्ठ व्यवस्थापक शिल्पा हुलसुरकर यांनी केले. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर भालके यांनी शिक्षकांचे मानसिक आरोग्य, शिक्षण आणि विद्यार्थी याविषयीचा अभ्यास अहवाल सादर केला. परिसंवादाच्या पहिल्या सत्रात प्रा. डॉ. अमित जैन, मनीषा जाधव, प्रिया पाटील, सुवर्णा पवार या शिक्षणतज्ज्ञांनी आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञ दिपाली क्षीरसागर यांनी सहभाग घेतला. दुसऱ्या परिसंवादात 'शिक्षकांचे मानसिक आरोग्य हा 'धोरणात्मक विचार' असायला हवा का?' या विषयावर चर्चा झाली. यामध्ये मॉडर्न कॉलेज पुणेच्या मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. साधना नातू, शिक्षणतज्ज्ञ हेमा होनवाड, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी सचिव डॉ. अनिल गुंजाळ, अहिल्यानगरचे शिक्षणाधिकारी (प्रा.) बी.जे. पाटील आणि संगथ संस्थेच्या मानसिक आरोग्य प्रकल्पाच्या प्रमुख प्राची खांडेपारकर यांनी सहभाग नोंदवला.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली की, मधाचे गाव योजनेच्या पहिल्या टप्प्यात २०२५-२६ या वर्षासाठी राज्यातील दहा गावांची निवड करण्यात आली आहे. यात विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील सिंधीविहिर आणि अमरावती जिल्ह्यातील आमझरी या गावांचा समावेश आहे. या योजनेसाठी घोलवड (पालघर), भंडारवाडी (नांदेड), बोरझर (नंदूरबार), काकडदाभा (हिंगोली), चाकोरे (नाशिक), उडदावणे (अहिल्यानगर), शेलमोहा (परभणी), सिंधीविहिर (वर्धा), साळोशी (सातारा) आणि आमझरी (अमरावती) या दहा गावांची निवड झाली आहे. या गावांना ५ कोटी १ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात निवडलेल्या सात गावांमध्ये सातेरी मधमाशी पालन आणि तीन गावांमध्ये बी हंटर्स द्वारे मध व मेण संकलनाचे काम सुरू झाले आहे. यासाठी एकूण ३४८ मधपाळांची निवड करून त्यांना दहा दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. योजनेंतर्गत लाभार्थ्यांना १ हजार ६५० मधपेट्या, १२८ संरक्षक पोशाख आणि २५ किटसह अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे साहित्य ९० टक्के शासकीय अनुदान आणि १० टक्के लाभार्थी स्वगुंतवणुकीच्या तत्वावर मिळेल. या योजनेत मधुबनाची स्थापना, सामूहिक सुविधा केंद्र, मध प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट, हनी माहिती व जनजागृती केंद्र, हनी थीम आधारित सेल्फी पॉईंट आणि मधुबनाची निर्मिती असे उपक्रम राबवले जातील. तसेच, मधमाशी व पर्यावरण विषयक सौंदर्यीकरण आणि थीम डेव्हलपमेंटवरही लक्ष केंद्रित केले जाईल. या उपक्रमांमुळे शेतकरी आणि ग्रामीण युवकांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल. त्याचबरोबर, विदर्भातील शुद्ध आणि दर्जेदार मधाला मोठी बाजारपेठ मिळण्यास मदत होईल, असे साठे यांनी नमूद केले. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील नरहर या गावाचीही मधाचे गाव योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. विविध निकषांची पूर्तता केल्यामुळे या गावाचा समावेश योजनेच्या पुढील टप्प्यात केला जाईल, अशी माहितीही साठे यांनी दिली.
पुण्यात सिंधी समाजाचे नूतन वर्ष आणि भगवान साई झुलेलाल यांच्या १०७६ व्या जन्मोत्सवानिमित्त 'चेटीचंड' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधू सेवा दलातर्फे हा महोत्सव शुक्रवारी (३० मार्च) येरवडा येथील डेक्कन कॉलेज बँक्वेट हॉलमध्ये होणार आहे. सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष सचिन तलरेजा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी, अशोक वासवानी, ऍड. हरेश हेमराजानी, विजय दासवानी, सचिव जय पिंजानी, सहसचिव किरण फेरवानी, खजिनदार राजेंद्र फेरवानी आणि जनसंपर्क अधिकारी देवेंद्र चावला उपस्थित होते. सचिन तलरेजा यांनी सांगितले की, चेटीचंड महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम आणि सिंधी समाज बांधवांचा मेळावा होणार आहे. सायंकाळी ७ वाजता भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करून महोत्सवाची सुरुवात होईल. यंदाचा चेटीचंड महोत्सव महिला सक्षमीकरणावर आधारित आहे. या महोत्सवात संपूर्ण महिला कलाकारांच्या संचाकडून सादरीकरण होणार आहे. यामध्ये संगीतकार, गायक आणि वादक सर्वच महिला कलाकार असतील. त्यांच्यातील क्षमता, कल्पकता आणि नेतृत्व पुणेकरांना अनुभवता येणार आहे. हे कलाकार जयपूर, भोपाळ, मुंबई, नागपूर आणि कोलकाता यांसारख्या विविध शहरांतून येत आहेत. नेटवर्क १८ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक किशोर आजवानी हे या महोत्सवाचे प्रमुख पाहुणे असतील. सिंधी समाजात 'कपिल शर्मा' म्हणून ओळखले जाणारे मोहित शेवानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. जनरेशन नेक्स्ट डान्स अकॅडमीतर्फे नृत्यकलेचे सादरीकरण होईल. त्यानंतर प्रीतिभोज (महाप्रसाद) देऊन महोत्सवाची सांगता होईल. सुरेश जेठवानी यांनी सांगितले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील चार ते साडेचार हजार सिंधी बांधव या महोत्सवात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. सिंधू सेवा दलाचा उद्देश सिंधी समाजाचा विकास करणे, समाजाच्या संस्कृतीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि सिंधू समाजाच्या परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. सिंधू सेवा दल गेली ३९ वर्षे कार्यरत आहे.
पुणे विमानतळ परिसरातील लोहगाव येथील कोट्यवधींच्या जमिनीच्या वादप्रकरणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाने पुणे जिल्हा न्यायालयाने यापूर्वी दिलेला एकतर्फी अंतरिम आदेश रद्द केला आहे. मात्र, या प्रकरणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित मालमत्तेबाबत दोन्ही पक्षांनी 'जैसे थे' (सध्याची स्थिती) कायम ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. हा वाद हवेली तालुक्यातील लोहगाव (सर्वे नं. २१४, हिस्सा नं. २) येथील सुमारे ३९,३९२ चौरस मीटर जमिनीच्या विकास हक्कांशी संबंधित आहे. रुणवाल एंटरप्रायझेस लिमिटेड या कंपनीने या जमिनीचे विकास हक्क आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, २००७ मध्ये झालेल्या संयुक्त विकास करारानुसार त्यांनी प्रकल्पाच्या विकासाची जबाबदारी स्वीकारली असून, अनेक वर्षांपासून त्यात मोठी गुंतवणूक केली आहे. या प्रकरणात, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे जिल्हा न्यायालयाने ब्रिज वॉटर रिअॅल्टी एलएलपीच्या अर्जावर सुनावणी करताना रुणवाल एंटरप्रायझेस लिमिटेडला वादग्रस्त मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करणे, हस्तांतरण करणे किंवा तृतीय पक्षाचा हितसंबंध निर्माण करण्यास मनाई करणारा अंतरिम आदेश दिला होता. या आदेशाला आव्हान देत रुणवाल एंटरप्रायझेस लिमिटेडने बॉम्बे उच्च न्यायालयात धाव घेतली. कंपनीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, जिल्हा न्यायालयात दाखल झालेल्या अर्जाबाबत कंपनीला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. तसेच, सुनावणीची संधी न देता एकतर्फी आदेश देण्यात आला आणि आदेश देताना त्याची कारणेही नोंदविण्यात आली नव्हती, असा दावा कंपनीने केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, १० मार्च २०२६ रोजी उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्द केला. तसेच, दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून अर्जाचा नव्याने विचार करण्याचे निर्देश दिले. अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित मालमत्तेबाबत 'जैसे थे' स्थिती कायम ठेवण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची सुनावणी प्राधान्याने घेऊन १७ मार्चपासून पुढील कार्यवाही सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, या वादासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चेंबूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ब्रिज वॉटर रिअॅल्टी एलएलपीचे भागीदार रणजित दारक आणि नितीन चव्हाण तसेच मित्तल कुटुंबातील सदस्यांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, वाद सध्या न्यायालयीन आणि मध्यस्थी प्रक्रियेत प्रलंबित आहे.
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यासह इतरांविरुद्ध ३७ कोटी ४८ लाख रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या विकसन करारातून ही फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गोयल, पटेल आणि ठकवाणी भागीदारी संस्थेच्या संचालकांचाही समावेश असून, पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महमंदवाडी परिसरातील सुमारे ३०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली जमीन आरोपींनी विकसनासाठी घेतली होती. या व्यवहाराच्या अनुषंगाने फिर्यादीकडून सुमारे २२ कोटी रुपये संबंधित संस्थेच्या खात्यात जमा करण्यात आले होते. मात्र, करारानुसार आवश्यक असलेले स्वतंत्र खाते उघडणे तसेच जमिनीचे निर्वेध मालकी हक्क मिळवून देण्याबाबत आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे. याउलट, संबंधित जागेवर प्लॅन सॅंक्शन आणि कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळवण्यासाठी फिर्यादींना १५ कोटी ४८ लाख रुपये खर्च करण्यास भाग पाडण्यात आले. या संपूर्ण व्यवहारात गेल्या १४ वर्षांपासून फिर्यादींची एकूण ३७ कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रारदारासोबत अधिकृत करार अस्तित्वात असतानाही, आरोपींनी सर्व्हे क्रमांक १८/१/१ मधील १२ गुंठे जमीन परस्पर नाना भानगिरे यांच्या नावे विक्री केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या व्यवहारासाठी कोणताही मोबदला घेतला गेला नव्हता. फिर्यादींचा हक्क डावलण्यासाठी आणि तिसऱ्या पक्षाचा हितसंबंध निर्माण करण्यासाठी हा व्यवहार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू होताच, संबंधित व्यवहार कायदेशीर असल्याचे दाखवण्यासाठी आरोपींनी २८ डिसेंबर २०२५ रोजी भानगिरे यांच्याकडून ९६ लाख रुपये स्वीकारल्याचे दाखवले. मात्र, मूळ खरेदीखताच्या वेळी कोणताही व्यवहार झाला नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार पूर्वनियोजित कट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून, संबंधित कागदपत्रांची छाननी केली जात आहे. दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यात पोलिस चौकीत शिपायाला धक्काबुक्की:सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
पुणे शहरातील मंगळवार पेठेतील गाडीतळ पोलीस चौकीत गोंधळ घालून एका पोलीस शिपायाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप त्याच्यावर आहे. फरासखाना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी संतोष विठ्ठल खंकाळ (वय ५३, रा. लोकसेवा तरुण मंडळाजवळ, मंगळवार पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस शिपाई प्रशांत तुर्डे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील एका वादावादीच्या प्रकरणात आरोपीला १४ मार्च रोजी दुपारी गाडीतळ पोलीस चौकीत बोलावण्यात आले होते. चौकीत आल्यानंतर आरोपी खंकाळने पोलीस शिपाई तुर्डे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तू मला बोलावून घेतले. तू साधा पोलीस शिपाई आहेस. तुला तपासाचा अधिकार नाही, असे बोलून त्याने अरेरावी केली. त्यानंतर त्याने तुर्डे यांना धक्काबुक्की केली आणि पोलीस चौकीच्या आवारात गोंधळ घातला. आरोपीने तुर्डे यांना, तुझ्याविरुद्ध माझ्याकडे खूप तक्रारी आल्या आहेत. तू मुलांना खोट्या गुन्ह्यात अडकवतो. तुझी तक्रार पोलीस आयुक्तांकडे करून नोकरी घालवतो, अशी धमकीही दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगले करत आहेत. प्रवासी महिलेची बांगडी चोरी पीएमपी प्रवासी महिलेच्या हातातील ९० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शिवाजीनगर भागात घडली. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ५४ वर्षीय महिला संगमवाडी भागात राहायला आहेत. त्या स. गो. बर्वे चौकातील (मॉडर्न कॅफे चैाक) एसएसपीएमएस शाळेजवळ असलेल्या बस थांब्यावर पीएमपी बसची वाट पाहत थांबल्या होत्या. बसमध्ये प्रवेश करत असताना गर्दीत चोरट्याने त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कटरचा वापर करुन चोरून नेली. पोलीस कर्मचारी एस घोटकुले तपास करत आहेत.
पुण्यातील सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरी, नगर रोड येथील डॉक्टरांनी ३३ आठवड्यांच्या मुदतपूर्व जन्मलेल्या एका बाळाला 'नेक्रोटायझिंग एन्टरोकोलायटिस' (एनईसी), सेप्सिस आणि कँडिडा पॅराप्सिलोसिस या गंभीर बुरशीजन्य संसर्गातून वाचवत नवजीवन दिले आहे. दोन टप्प्यांतील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि दीर्घकाळ चाललेल्या अतिदक्षता उपचारांमुळे हे यश मिळाले आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वी जन्मलेल्या या बाळाची प्रकृती अचानक खालावल्याने त्याला तातडीने नगर रोड येथील सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल – मॉमस्टोरी येथे दाखल करण्यात आले. मुदतपूर्व जन्म आणि गंभीर संसर्ग यामुळे बाळाची स्थिती अत्यंत गुंतागुंतीची आणि जीवघेणी होती, ज्यासाठी तातडीची वैद्यकीय व्यवस्थापन आवश्यक होते. सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरी येथील नवजात बालरोग विभागाचे संचालक डॉ. प्रदीप सूर्यवंशी आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने बाळाच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारली. बाळाची प्रकृती गंभीर असल्याने १२ फेब्रुवारी २०२५ रोजी ज्येष्ठ बालशस्त्रक्रियातज्ञ डॉ. प्रणव जाधव यांनी आपत्कालीन एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेदरम्यान आतड्याचा खराब झालेला भाग काढून टाकण्यात आला आणि ‘इलिओस्टॉमी’ करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतरचा काळही अत्यंत आव्हानात्मक होता. सेप्सिसशी लढण्यासाठी बाळाला सतत व्हेंटिलेटर सपोर्ट, इनोट्रोप्स आणि उच्च क्षमतेच्या अँटीबायोटिक्स देण्यात आले. नवजात बालरोगतज्ञ, बालशस्त्रक्रियातज्ञ आणि अतिदक्षता तज्ञ यांच्यातील समन्वयामुळे बाळाची प्रकृती हळूहळू स्थिर होऊ लागली. यानंतर बाळाच्या वजनवाढीचे मोठे आव्हान होते. आतड्याचा काही भाग काढून टाकल्यामुळे पोषणतत्वे शोषण्यास अडचण येत होती. त्यामुळे डॉक्टरांनी विशेष फॉर्म्युला आहार आणि टोटल पॅरेंट्रल न्यूट्रिशन (टीपीएन) द्वारे बाळाची काळजी घेतली, ज्यामुळे त्याला आवश्यक पोषण मिळाले. बाळाचे वजन आणि ताकद वाढल्यानंतर डॉक्टरांनी दुसरी सुधारात्मक शस्त्रक्रिया केली. यामध्ये पुन्हा एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी करून ‘इलिओ-कोलिक ॲनास्टोमोसिस’द्वारे आतड्याचे निरोगी भाग पुन्हा जोडण्यात आले, ज्यामुळे शौचाची प्रक्रिया नैसर्गिकरित्या सुरू होऊ शकली. सध्या हे बाळ एक वर्षाचे असून त्याची वाढ वयानुसार योग्य पद्धतीने होत आहे. दोन टप्प्यांतील शस्त्रक्रिया आणि नवजात अतिदक्षता विभागातील अनेक महिन्यांच्या उपचारांमुळेच या अत्यंत कठीण प्रकरणात यश मिळाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सिंधी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे सातवे पर्व यंदा १० एप्रिल ते ३ मे २०२६ या कालावधीत पिंपरी येथे होणार आहे. या स्पर्धेत १६ पुरुष आणि सात महिला संघ सहभागी होणार आहेत. पिंपरी येथील एमसीसी, मृणाल क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सिंधी प्रीमिअर लीगच्या फेसबुक पेजवरून पाहता येणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे नरेश नशा आणि बिपीन दखनेजा यांनी पत्रकार परिषदेत दिली. रावेत येथील हॉटेल ब्ल्यू वॉटरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेला उद्योजक डब्बू आसवानी, श्रीचंद आसवानी, तसेच संयोजन समितीतील रोनक पंजाबी, अविनाश इसरानी, अंकुश मुलचंदानी, करण आसवानी, अवि तेजवानी, सोमेश गिडवाणी, कुणाल गुडेला, मनीष गेरेजा, यश थडानी, कंवल खियानी, गुलशन गंगवानी, कामेश पमनानी, पवन कोटवानी, मयूर तिलवानी यांच्यासह अनेक संघमालक आणि प्रायोजक उपस्थित होते. डब्बू आसवानी यांनी सांगितले की, सिंधी समाजातील तरुण उद्योजकांनी एकत्र येऊन या क्रिकेट लीगचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा आता समाजाचा एक महोत्सव बनली आहे. यातून निरोगी व व्यसनमुक्त आयुष्य, तसेच तंदुरुस्ती याविषयी समाजात जागरूकता वाढत आहे. मोबाईल-इंटरनेटच्या जाळ्यात न अडकता मैदानावर खेळण्याला प्रोत्साहन मिळत आहे. या स्पर्धेतून उभारलेल्या निधीचा समाजासाठी उपयोग केला जातो. यंदा या निधीतून साधू वासवानी मिशन येथील एका विद्यार्थिनीचे संपूर्ण पालकत्व स्वीकारले जाणार आहे. श्रीचंद आसवानी यांनी माहिती दिली की, 'सिंधी प्रीमिअर लीग सीजन-७' चे उद्घाटन १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी माजी क्रिकेटपटू, सिंधी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, खेळाडू, संघमालक आणि कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. गेल्या सातही हंगामात या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला असून, पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून खेळाडू सहभागी झाले आहेत. महिलांनाही खेळासाठी प्रोत्साहन दिले जात असून, यंदा महिलांचे सात संघ स्पर्धा खेळणार आहेत. बिपीन दखनेजा यांनी सांगितले की, आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. पुरुषांचे १६ संघमालक आणि महिलांचे सात संघमालक आपल्या एकूण २३ संघांसह स्पर्धेत उतरणार आहेत. पुरुष संघांची नावे सिंधी संस्कृतीवर आधारित आहेत, तर महिला संघांची नावे नद्यांवर आधारित आहेत. या स्पर्धेत ९८ महिला खेळाडू आणि २५६ पुरुष खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
स्त्री सक्षमीकरणाचा मार्ग स्त्रीशिक्षणातूनच पुढे जाऊ शकतो, असे प्रतिपादन एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी केले. शिक्षणामुळे स्त्रीला कौशल्ये, आर्थिक स्वावलंबन मिळते आणि व्यक्ती, कुटुंब व समाज स्तरावर निर्णयाचे स्वातंत्र्य मिळते, असे त्या म्हणाल्या. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, हिंदुस्थान आयोजित 'नारी शक्ती - सन्मान आणि संवाद - २०२६' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. एमईएस गावडे सभागृह, भावे विद्यालय, सदाशिव पेठ येथे हा कार्यक्रम पार पडला. महर्षी कर्वे यांच्या दूरदृष्टीमुळेच एस.एन.डी.टी. महाविद्यालयाची स्थापना होऊन अनेक पिढ्यांतील स्त्रियांच्या सक्षमीकरणाला दिशा मिळाली, असेही डॉ. चक्रदेव यांनी नमूद केले. या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्यासह श्री गुरुकुलम् न्यास, कल्याणच्या संस्थापक अध्यक्ष मंजिरी फडके, उद्योजिका वीणा गोखले आणि प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका स्नेहल तरडे यांच्याशी संवाद साधण्यात आला. डॉ. शुभा साठे आणि अनुराधा मुन्शी यांनी हा संवाद घडवून आणला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी हेही व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कला, क्रीडा, उद्योग, शिक्षण आणि समाजसेवा या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तबगार स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यात आला. प्रेरणा सहाणे दीक्षित (कला), गौरी गाडगीळ (क्रीडा), रक्षा देशपांडे (शिक्षण आणि समाजकार्य) आणि सुजाता शहा (उद्योजिका) यांचा विशेष सन्मानार्थींमध्ये समावेश होता. डॉ. चक्रदेव यांनी पुढे सांगितले की, महर्षी कर्वे यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्त्रीशिक्षणासाठी केलेले प्रयत्न महत्त्वाचे होते. आज लाखो मुली एस.एन.डी.टी. महाविद्यालयाच्या विविध संकुलांतून २०० हून अधिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत. स्त्रियांचे कर्तृत्व कुटुंबापासून विश्वकुटुंबापर्यंत विस्तारत आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. मंजिरी फडके यांनी भगवद्गीतेतील स्त्री सबलीकरणाच्या विचारांवर प्रकाश टाकला. सृजनशक्ती केवळ स्त्रीपाशी असून, श्री, धृती, वाणी, मेधा, क्षमा यांच्या रूपाने स्त्रीशक्तीच्या विविध पैलूंचे वर्णन गीतेत आहे, असे त्यांनी सांगितले. अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी निरीक्षण नोंदवले की, स्त्रीपाशी असलेल्या सृजनशक्तीचा नकारात्मक अर्थ न घेता, ते वरदान मानण्याची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. कुटुंब हे केवळ स्त्रीचे नसून, ते प्रत्येक घटकाचे असते, याचे भान नव्या पिढीत आता दिसत आहे, हे चित्र आशादायी आहे, असे त्या म्हणाल्या.

31 C