SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
... ...View News by News Source

स्थानिक निवडणुकीचा निर्णय स्थानिक स्तरावर:विखे पाटील शरद पवारांवर बोलले कारण आमचे नाणे मार्केटमध्ये चालते – सुप्रिया सुळे

सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे.राधाकृष्ण विखे पाटील हे माझ्यापेक्षा वयाने, पदाने मोठे आहेत पण एवढे असताना त्यांना शरद पवारांचे नाव घेत टीका करावी लागते म्हणजे आमचे नाणं मार्केटमध्ये चालते आहे. जर असे नसते तर विखे पाटील शरद पवारांवर बोललेच नसते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक नेतृत्वाला युती आघाडीबद्दल जे योग्य वाटेल तो निर्णय घेतलेला आहे. पक्षाने त्यासाठी सुट दिली आहे. त्या पद्धतीने सर्व काम सुरू आहे. मंगळवारी पक्षाचे किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत हे स्पष्ट होईल. बिहार विजयाचे श्रेय नितीशकुमारांचे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आशिष शेलारांनी टीका केली ती त्यांची बोलायची स्टाईल आहे. लोकशाहीमध्ये फार काही कुणाचे मनावर घ्यायचे नसते. आम्ही राज्याची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांशी आमचे चांगले संबंध आहेत त्यांच्या कुटुंबात काय सुरू आहे हे आम्हाला माहिती नाही. बिहार निवडणुकीचे श्रेय हे नितीशकुमारांचे श्रेय आहे. आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. दमानिया अभ्यासपूर्वक आरोप करतात सुप्रिया सुळे म्हणाल्या की, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते त्यामुळे तिथे युती, आघाड्या बदलतात हे काही नवीन नाही. अनेक वेळा अशा गोष्टी होत असतात. अंजली दमानिया या अभ्यासपूर्वक आरोप करत असतात. त्यांना कोर्टात जाण्याचा अधिकार दिलेला आहे. ईडी ही स्वायत्त संस्था आहे. पण ईडीच्या मागे एक अदृश्य शक्ती त्याच्या मागे आहे. हा आरोप मी करत नाही कोर्टाने त्यांना फटकारले आहे. ईडीने अनेकांवर आरोप केले पण त्यात तथ्य नव्हते त्यावर कोर्टाने ताशेरे ओढले होते. संस्था चांगली असली तरी त्यामागील अदृश्य शक्तीमुळे हे सर्व होत असेल असे मला वाटते. तुम्ही काय मेसेज देतात? सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कोणत्या किल्ल्यावर दारु पिण्याचे मला काही आश्चर्य वाटत नाही. कारण तुळजापूर जे आपले श्रद्धास्थान आहे. तिथे ड्रग्ज तस्करी होते ज्यांना त्यांच्यामध्ये अटक झाली त्याला सत्ताधारी पक्षात प्रवेश देण्यात आला तुम्ही काय मेसेज देत आहात? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. ड्रग्ज विरोधात मतभेद बाजूला ठेवत काम केले पाहिजे. त्यासाठी सरकार काही करत असेल तर आम्ही सरकारबरोबर उभे राहू. निवडणूक हा काही व्यवहार नाही प्रफुल्ल पटेल यांचे राजकारण काय आहे मला माहिती नाही, पण मी एक नाही चार वेळी निवडून आले आहे. पैसे दिल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही असे मला तरी वाटत नाही. निवडणूक हा काही व्यवहार नाही ही एक सेवा आहे, असे मी समजते. ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहले पारदर्शक निवडणूकीसाठी अनेकांनी आपले योगदान दिले त्याची खिल्ली उडवणारी ही पटेलांची विचारधारा आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 11:57 am

ठाणे महापालिकेसाठी जितेंद्र आव्हाडांची मोठी खेळी:पत्नी ऋता यांना मैदानात उतरवणार, नगरसेवक फोडणाऱ्या शिंदे गटाला तगडे आव्हान

ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (शप) पक्षाची होत असलेली पडझड थांबवण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठी राजकीय खेळी केली आहे. पक्षाला नवी उभारी देण्यासाठी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या भागात थेट आव्हान उभे करण्यासाठी, आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी प्रभाग क्रमांक २३ मधून महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ठाणे शहरातील शिंदे यांच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, राष्ट्रवादी (शप) पक्षातून झालेल्या पक्षांतराला प्रत्युत्तर देण्यासाठी आव्हाडांनी ही 'मास्टरस्ट्रोक' खेळी केल्याचे मानले जात आहे. नऊ नगरसेवकांच्या पक्षांतराला देणार प्रत्युत्तर गेल्या वर्षभरात ठाणे महापालिकेमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेने मोठा राजकीय धक्का दिला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (शप) पक्षाच्या तब्बल नऊ माजी नगरसेवकांना फोडून शिवसेनेत प्रवेश देण्यात आला होता. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातील हा भाग असल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले होते. हाच बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी आणि गमावलेले संख्याबळ परत मिळवण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही 'फॅमिली एन्ट्री' घडवून आणली आहे. ऋता आव्हाड यांनी राष्ट्रवादी शप पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे इच्छुक उमेदवारीसाठी अर्ज सादर केला आहे. जे नऊ माजी नगरसेवक पक्षांतर करून गेले आहेत, त्यांना ऋता आव्हाड यांच्या उमेदवारीमुळे मोठा धक्का दिला जाणार आहे, असा विश्वास जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी व्यक्त केला. जनसंपर्काच्या जोरावर शिवसेनेला आव्हान प्रभाग क्रमांक २३ हा राष्ट्रवादी (शप) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी तगडा उमेदवार देण्याची गरज असताना, ऋता आव्हाड यांचे नाव पुढे आले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याप्रमाणेच ऋता आव्हाड यांचा कळवा आणि मुंब्रा परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. त्यांनी विशेषतः कळवा परिसरातील महिला सक्षमीकरणासाठी मोठे काम केले आहे. 'संघर्ष (महिला)' संस्थेच्या माध्यमातून त्या घरोघरी पोहोचलेल्या आहेत. आत्तापर्यंत सामाजिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलेल्या ऋता आव्हाड यांनी प्रथमच थेट राजकारणामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. ऋता आव्हाडांमुळे शिवसेनेला नमवणे शक्य जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी स्पष्ट केले की, आमदार आव्हाड यांनी कळव्याचा कायापालट केला आहे. विकासकामांच्या जोरावरच त्यांचे मताधिक्य वाढत आहे. या विकासकामांना ऋता आव्हाड यांच्या जनसंपर्काची जोड मिळाल्यास शिवसेनेला नमवणे शक्य होईल. एकंदरीत, नऊ माजी नगरसेवकांच्या पक्षांतराने बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादी (शप) पक्षाने ऋता आव्हाड यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून 'विकेट टू विकेट' लढत देण्याची तयारी केली असून, आता ठाणे महापालिकेची ही निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 11:40 am

बिहार निवडणुकीतील उमेदवार स्थानिक नेत्यांच्या निर्णयानुसार:आम्ही प्रचारात सहभागी नव्हतो- प्रफुल्ल पटेल; गोंदिया-भंडाऱ्यात स्वबळावर लढणार

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काही उमेदवार उभे केले होते, परंतु सर्वांचेच डिपॉझिट जप्त झाले. बिहारमध्ये निवडणूक लढवू नये असे मी सांगितले होते, पण प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवार दिले असे अजित पवारांनी म्हटले होते. यानंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले की, पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने निवडणूक लढविण्याचा आग्रह केला नव्हता. निवडणूक लढवावी, असा आमचा आग्रह नव्हता. मी प्रचारालाही गेलो नाही हा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतला. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, स्थानिक स्तरावर काही जणांची इच्छा असते की आपल्या पक्षाने निवडणूक लढवली पाहिजे. हा निर्णय पूर्णपणे स्थानिक नेतृत्वाने घेतलेला होता. आमच्या पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाकडून यावर काही विशेष लक्ष दिलेले नव्हते.बिहार निवडणुकीसाठी उमेदवार देण्याचे अंतिम आदेश अजित पवार यांनी दिलेले नव्हते, तरीही स्थानिक स्तरावर पक्षाच्या संघटनांनी उमेदवार उभे केले. बंगालमध्ये येऊ शकते भाजप सरकार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, बिहारमधून गंगा नदी पश्चिम बंगालपर्यंत जात असल्याने हे ममता बॅनर्जी यांना एक प्रकारे इशारा आहे. पंतप्रधान मोदींच्या धोरणाचा परिणाम शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान होणाऱ्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची कामगिरी चांगली राहणार आहे. या निवडणुकीत जास्त उमेदवार निवडून येतील कदाचित सरकार सुद्धा येईल. त्यामुळे गंगा ते गंगा सागर असा पंतप्रधानांचा नारा योग्य आहे. गोंदियात स्वबळावरच लढणार प्रफुल्ल पटेल म्हणाले, महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये कार्यकर्त्यांची उत्सुकता खूप जास्त आहे. 9 वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना न्याय देणे महत्त्वाचे आहे. तिन्ही पक्ष एकत्र लढले, तर काही वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात. त्यामुळे स्थानिक निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा लागतो. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील निवडणुका आम्ही स्वबळावरच लढत आहोत, आणि आवश्यक असल्यास काही ठिकाणी तडजोड करू.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 11:20 am

उरण नगरपरिषद निवडणूक:राजकारणात एवढा गर्व ठेवू नये, सूरज निकलात है, तो डुबता भी है; जितेंद्र आव्हाडांचे शेलारांना प्रत्युत्तर

उरण नगरपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगात सुरू असून या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या भावना घाणेकर यांनी अर्ज दाखल केला. या कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी थेट आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल करत “राजकारणात एवढा गर्व ठेवू नये… सूरज निकलता है तो रात को डुबता भी है” अशा शब्दांत तीव्र टीका दिली. उरण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना चांगलाच ऊत आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनी “महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजणार” अशी टीका केली होती. यालाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार शब्दांत प्रत्युत्तर देत राजकीय वातावरण तापवले आहे. नेमके काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? महाविकास आघाडीच्या वतीने उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या भावना घाणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आशिष शेलार यांच्या टीकेला उत्तर देताना, आशिषजी, गर्विष्ठाचे घर नेहमी रिकामे होते. राजकारणात एवढा गर्व ठेवू नये. घर नेहमी खाली होते. सूरज निकलता है तो रात को डुबता भी है, हे लक्षात ठेवा, असा पलटवार केला. महायुतीचेही अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन दरम्यान, उरण नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना, भाजप–महायुतीनेही उरणमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदांसाठी एकूण 22 अर्ज दाखल करण्यात आले. नगराध्यक्षपदासाठी शोभा कोळी–शहा या प्रथमच मैदानात उतरल्या असून, या निमित्ताने गणपती चौक ते नगरपालिका कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे वातावरण उत्साहपूर्ण होते. यावेळी शेलार यांनी “या निवडणुकीत भाजप-महायुतीची मते दुप्पट होतील आणि विरोधकांचे तीन तेरा वाजतील” असा विश्वास व्यक्त केला. उरण नगरपरिषद निवडणूक चुरशीची होणार यंदाच्या उरण नगरपरिषद निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध शिवसेना (उबाठा) आणि महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. त्यामुळे एकीकडे आव्हाड–शेलार यांच्यातील वाकयुद्ध आणि दुसरीकडे दोन्ही पक्षांची ताकद दाखविणाऱ्या रॅल्या—या घडामोडींमुळे उरणची निवडणूक यंदा अधिकच चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 10:58 am

शरद पवारांच्या पक्षाचे अस्तित्व संपुष्टात:कार्यकर्तेच नसल्याने अजित पवारांकडे येण्याशिवाय पर्याय नाही, राधाकृष्ण विखे पाटील यांचा घणाघात

शरद पवार यांच्या पक्षात जर कार्यकर्तेच राहिले नाहीत तर त्यांना अजित पवारांसोबत येण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. त्यांच्या पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शरद पवारांनी इतके वर्ष जे राजकारणात पेरले त्यांचे आता प्रायश्चित करण्याची वेळ आता आली आहे, असा टोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अजित पवार आणि शरद पवार येतील का नाही याचे उत्तर शरद पवार हेच देऊ शकतील. कारण त्यांनी आतापर्यंत सोयीप्रमाणे अनेक लोकांशी युत्या केल्या आहेत. या सर्व युत्या राष्ट्राचे व्यापक हित पाहून झाल्या होत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणासोबत आघाडी करायची याबाबत स्थानिक पातळीच्या नेत्यांना मोकळीक दिल्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी सांगितले. याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता, त्यांनी शरद पवारांना हा टोला लगावला आहे. काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याचीही वेळ राहिलेली नाही बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर जोरदार शब्दांत टीका केली. विदेशात जाऊन लोकशाहीचे धडे देणाऱ्या काँग्रेसला आता आत्मपरीक्षण करण्याची देखील वेळ राहिलेली नाही, असा घणाघात करत विखे पाटील म्हणाले की, बिहारमध्ये विरोधकांचा सुपडा साफ झाल्यानंतर काँग्रेसचे अस्तित्वच संपुष्टात आल्याचे दिसत आहे. काँग्रेससोबत जाण्यास कुणी तयार नाही महाराष्ट्रात काँग्रेस ‘एकला चलो रे’ म्हणत आहे, कारण त्यांच्यासोबत जाण्यास कोणी तयार नाही, असे विखेंनी टोलेबाजी केली. बिहारमध्ये काँग्रेसचे नेते नदीत पोहण्याचे प्रदर्शन करत होते, जनतेने त्यांना त्याच नदीत राजकीय गटांगळ्या खायला लावल्याची टीका त्यांनी केली. राज्यात ठाकरे बंधू, जाणते राजे आणि इतर नेत्यांनी ‘वोट चोरी’च्या मुद्द्यावर मोर्चे काढले होते, त्यावर निशाणा साधत विखेंनी म्हटले, लोकांनी यालाच मतपेटीतून योग्य उत्तर दिले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राज्यात राजकीय अटकळींना उधाण आले आहे. ही भेट पार्थ पवार यांच्यावर झालेल्या आरोपांच्या संदर्भात महत्त्वाची मानली जात असताना, याबाबत विचारले असता विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अजित पवार–अमित शहा यांच्या भेटीबाबत मला काहीही माहिती नाही. काही निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले जातात, असे त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 10:25 am

काँग्रेसचा इतिहास सर्वांना ठाऊक; गायकवाडांनी तोंडाला आवर घालावा:देशपांडेंचा काँग्रेसवर घणाघात; आम्ही युतीचा प्रस्ताव दिलाच नाही

काँग्रेसचा इतिहास काय आहे हे सर्वांना माहिती आहे, मला त्याबद्दल जास्त बोलायचे नाही. काँग्रेसने कुणाला मारलं, कुणाला झोडले, कुणाला ठेवले हा सर्व काँग्रेसचा इतिहास आहे, त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी तोंडाला आवर घालावा, यापेक्षा जास्त मी बोलणार नाही त्या जे मुंबई मनपा एकट्या लढणार आहेत त्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले की, आम्ही काँग्रेसला कधीही कुठल्या युतीचा प्रस्ताव दिलेला नव्हता ना त्यांनी आम्हाला युतीचा प्रस्ताव दिला होता, काही लोकांमध्ये सुरू असलेल्या चर्चा या वायफळ आहेत त्यांना काही अर्थ नाही. मनसेची मुंबई मनपा निवडणुकीसाठी बैठक पार पडली यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी असे म्हटले आहे. दादागिरी सहन करणार नाही संदीप देशपांडे म्हणाले की, परप्रांतीय लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुंबई आणि महाराष्ट्र सर्वप्रथम मराठी माणसाचा आहे.इथे मराठी माणसाचीच दादागिरी चालणार बाहेरच्याची दादागिरी सहन केली जाणार नाही. काँग्रेसने आत्मचिंतन करावे संदीप देशपांडे म्हणाले की, बिहारच्या निवडणुकीत काँग्रेस ज्या पद्धतीने आपटली आहे त्यानंतर त्यांनी आत्मचिंतन करावे. दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा त्यांना आपण कुठे कमी पडत आहोत यावर लक्ष दिले पाहिजे. बिहारच्या निवडणुकीचा निकाल लागून काही फार वेळ झाला नाही, थोडा वेळ जाऊ दिला तर सत्य काय हे बाहेर येईल. काँग्रेस मनसे सोबत जाणार नाही म्हणत आहे पण त्यांना आमंत्रण दिले कुणी असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे. स्वत:च चिंता करायची स्वत:च आमंत्रण करायची आणि स्वत:च नाही म्हणायचे ह्या गोष्टीला काही अर्थ नाही. आम्ही त्यांना प्रस्ताव दिला नाही त्यामुळे आमचा काही विषय नाही, असे म्हणत मुंबई निवडणुकीत मारहाण करणाऱ्या पक्षासोबत जाणार नाही या काँग्रेसच्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 9:36 am

गीत फुलोरा संगीतमय शैक्षणिक कार्यक्रमाचे 21 व्या वर्षात पदार्पण....:गीत फुलोराच्या कवितांमध्ये विद्यार्थी शिक्षकांनी धरला ठेका

स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी, पुनावळे आणि वाकड यांच्या निर्मितीतील ‘गीत फुलोरा’ या संगीतमय शैक्षणिक काव्यगायन कार्यक्रमाने यंदा 21व्या वर्षात पदार्पण केले. बालदिनाचे औचित्य साधत एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, रहाटणी येथे हा कार्यक्रम भव्य उत्साहात सादर झाला. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ विद्यार्थ्यांच्या ओठांवर शालेय अभ्यासातील कविता सहजपणे चढवणारा ‘गीत फुलोरा’ हा एकमेव संगीतमय शैक्षणिक उपक्रम आहे. अभय–अर्पिता तसेच त्यांच्या मुलांनी—अथर्व आणि भाग्यदा—कविता, संगीत आणि प्रस्तुती यांचा सुंदर संगम घडवत या कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी कवितांच्या तालावर ठेका धरत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 2004 मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाने 20 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास पूर्ण करत आता 21व्या वर्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या बालपणीच्या कविता पुन्हा आठवल्या. चौथीतील विद्यार्थिनी भाग्यदाने ‘आई’ आणि ‘चांदोमामा’ या कविता मैफिलीत विद्यार्थ्यांकडून गाऊन घेऊन कार्यक्रमाला अधिक रंगत भरली. ‘शाळा’, ‘माझ्या मराठीची गोडी’, ‘आर्जव’, ‘या बालांनो या रे या’, ‘एक झाड लावू’ अशा अनेक लोकप्रिय कवितांची मनमोहक प्रस्तुती करण्यात आली. सर्व कवितांना अभय–अर्पिता यांनी संगीतबद्ध केले असून विद्यार्थ्यांनी उत्साहाने साथ दिली. “‘गीत फुलोरा आहे संगतीला, कविता गायन करायला चला’” या ओळींवर मुलांनी ताल धरत काव्यसंगीताचा मनमुराद आनंद लुटला. ‘या बालांनो या रे या’ या कवितेला तर विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र फेर धरून रंगत आणली. स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नित्यनवीन उपक्रम राबवत असते. अकॅडमीमधील विद्यार्थी—आर्यन पावसे, प्रिशा जोशी, वीरा सुरते, राजवी पटेल, अश्वि नाकाडे—यांनी सहगायन केले. तर अर्जुन नेटके, वंशराज वरखडे, विकास शिंदे, आलोक पाटोळे, नयन शिवरकर, हर्ष, वैभव यांसह वाद्यवृंदाने सुरेल साथ देत कार्यक्रमात पाहुणचार केला. मुख्याध्यापिका जयश्री वेंकटरामन यांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला. “मुलांमध्ये कविता आणि साहित्याविषयी आवड निर्माण करणारा असा उपक्रम प्रत्येक शाळेने आयोजित करावा,” असे मत त्यांनी व्यक्त केले. उपमुख्याध्यापिका लक्ष्मीजी, मधुमिता देव, हेमराज थापा, विजय नेलगे, भोसले, सोनल श्रीवास्तव तसेच शिक्षक–विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगीत, कविता आणि बालमैत्रीपूर्ण सादरीकरण यांच्या सुंदर संगमात पार पडलेला ‘गीत फुलोरा’ कार्यक्रम बालदिन संस्मरणीय करून गेला.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:56 am

इच्छुकांची मतदारांसाठी फिल्डींग; मतदान केंद्रनिहाय यादीची प्रतिक्षा:जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक, नवमतदार केंद्रस्थानी‎

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदारांची संख्या निश्चित झाली आहे. जिल्ह्यात एकूण ८ लाख ६३ ंहजार ३९१ मतदार असून, इच्छुकांनी आता नवमतदार खेचण्यासाठी आतापासूनच फिल्डींग लावली आहे. आता २४ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी आेबीसी आरक्षणाच्या याचिकेवर निर्णय दिल्यानंतर जि.प. व पं.स.च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सरकारी यंत्रणांकडून तयारी करण्यात येत असून, यापूर्वी प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर आरक्षण सोडतीही पार पडली होती. मतदार यादीचा कार्यक्रमही जाहीर झाला. त्यानुसार मतदार यादी तयार करण्यात आली असून, या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानुसार इच्छुकांमध्ये मतदार खेचण्यासाठी रस्सीखेच होणार आहे. असा आहे कार्यक्रम: राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. मतदार यादी ३ नोव्हेंबर रोजी अधिप्रमाणित झाली. २) मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २४ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाईल. तालुका जि.प. पं.स. तेल्हारा ०७ १४ अकोट ०८ १६ अकोला १० २० मूर्तिजापूर ०७ १४ बाळापूर ०७ १४ बार्शिटकाळी ०७ १४ पातूर ०६ १२ वंचित : जि.प.मध्ये सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीला कोणालाच सोबत घेण्याची राजकीय दृष्ट्या आवश्यकता नाही. तसेही यंदा वंचितची सदस्य संख्या आयारामांमुळे २८ झाली असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्वळाचीच शक्यता आहे. शिवसेना : जि.प.मध्ये क्रमांक दोनचा पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाने महाविकास आघाडीत ५२ पैकि ३६ जागांवर दावा केल आहे. विधानसभेचा बाळापूर मतदारसंघ ताब्यात असल्याने ठाकरे गट कमी जागा लढण्याच्या मन:स्थितीत नाही. भाजप : नगर परिषदमध्येच भाजपने एकला चलोरेच्या दिशेने वाटचाल सुरु केली असतानाच जि.प.वर भाजपची सत्ता आणा, असे आवाहन प्रदेश नेत्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना एका कार्यक्रमात केले. त्यामुळे जि.प.मध्ये महायुती होण्यावरून साशंकता आहे. काँग्रेस : पाच पैकी दोन सदस्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने ते सर्कल हातात राहण्यासाठी स्थानिक नेतृत्वाला एकिकडे संघर्ष करावा लागणार असून, दुसरीकडे मविआमध्ये सोयीच्या जागा पदरात पाडून घेण्याचे आव्हान आहे. राकाँ : पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी कांंॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर सध्याच्या चार जागा टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. मात्र न.प. मध्ये मविआमध्ये एकमत होत नसल्याने जि.प.मध्ये जागा वाटापावरून रस्सीखेच होणार असून यात वेळ गेल्यास कोंडी होणार आहे. शिवसेना शिंदे गट : मूळ शिवसेनेचे तीन सदस्य शिंदे गटात गेले असून, दोन माजी सदस्यही पक्षात आले आहेत. सध्या आयारामांवरच भर देण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागात नसलेले मजबूत नसलेले पक्ष संघटन, बाळापूरमध्ये झालेला दारूण पराभव, पक्षाअतंर्गत वाद आदींमुळे िज.प. निवडणुकीत कामगिरी उंचवण्याचे आव्हान स्थानिक नेतृत्वापुढे राहणार आहे. तालुका स्त्री पुरुष एकूण तेल्हारा ५०८८५ ५४८७९ १०५७६४ अकोट ६८६३९ ७२९६९ १४१६११ अकोला ८४८११ ८९१६५ १७३९८० मूर्तिजापूर ५७१८६ ६०५८३ ११७७३१ बाळापूर ५८६५७ ६२२४९ १२०९०७ बार्शिटाकळी ५१३२५ ५४३९० १०५७१६ पातूर ४७३४९ ५०३३३ ९७६८२ एकूण ४१८८३४ ४४४५४९ ८६३३९१

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:48 am

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या असहकार आंदोलनामुळे अनुदान वाटप रखडले:मदत वाटपाचे आदेश रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन‎

तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदत वाटपाच्या प्रक्रियेत त्यांच्यावर अन्याकारक पद्धतीने जबाबदाऱ्या लादल्या जात आहेत. मुद्द्यावरून असहकार आंदोलन १० नोव्हेंबर २०२५ पासून सुरुवात केले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोरे यांना दिले आहे. या असहकार आंदोलनामुळे खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान वाटप रखडल्याचे म्हटल्या जात आहे. अतिवृष्टीच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या तालुक्यातील ४० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम लवकरात लवकर गेली पाहिजे, याकरिता शासनाने आदेश काढलेले आहेत. ग्रामपंचायत अधिकारी यांनी दिनांक १० नोव्हेंबर २०२५ पासून असहकार आंदोलनाला सुरुवात केली आहे. अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांना मदत वाटपाच्या प्रक्रियेत ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर अन्यायकारक पद्धतीने जबाबदाऱ्या लादल्या जात आहे. ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे म्हणणे आहे.अतिवृष्टी प्रकरणी तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अधिकारी नियमानुसार मदतकार्य करण्यास तयार असले तरी त्यांच्याकडे जमिनीची सविस्तर माहिती उपलब्ध नसल्याने चुकीच्या लाभार्थ्याला अनुदान मिळण्याची शक्यता वाढते, असे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे म्हणणे आहे. यामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर प्रचंड कामाचा ताण निर्माण झाला आहे. दैनंदिन ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा व्यवस्था, वसुली तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. कृषी मदत वितरणासाठी स्वतंत्र गावनिहाय आदेश तत्काळ रद्द करावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मागण्यांसाठी ग्रामपंचायत अधिकारी संघटना तालुका शाखा, मूर्तिजापूर यांच्या वतीने असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष देवानंद डोंगरे, सचिव सुनील मानकर, उपाध्यक्ष गोवर्धन जाधव, कार्याध्यक्ष अमितकुमार कुरुमकर, महिला उपाध्यक्ष जोशना उमाळे, राज्य कार्यकारिणी प्रतिनिधी करुणा वानखडे तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. आंदोलनामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींचे नियमित कामकाज ठप्प झाले आहे. तालुक्यात अतिवृष्टीने बाधित ४० हजार शेतकरी आहे. त्यापैकी २५ ते ३० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान देण्यात आल्याचे समजले. अनुदान वाटपाला विलंब होणार नाही नैसर्गिक आपत्तीत सर्वांनी मिळून काम करायचे असते. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे असहकार आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे अनुदान वाटपाला विलंब होणार नाही. याकरिता राहिलेले उर्वरित काम पूर्ण करण्याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करुन पूर्ण करण्याचे सांगणार आहे. - मिलिंद मोरे , गटविकास अधिकारी, पं. स. मूर्तिजापूर.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:46 am

जनता भाजी बाजाराची जागा मनपाला मिळणार:जिल्हाधिकाऱ्यांकडून मनपाला हस्तांतरण कागदपत्राची प्रतीक्षा‎

शहरातील जनता भाजी बाजाराची जागा महापालिकेला लवकरच हस्तांतरित होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तांतरण कागदपत्रे महापालिका प्रशासनास दिल्यानंतर या महत्त्वाकांक्षी जागेच्या विकासाची पुढील कार्यवाही सुरू होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. जुन्या बसस्थानकाची जागा १ लाख ४ हजार ७५ चौरस फूट, गांधी जवाहर बागेजवळील जागा ४३ हजार २०० चौरस फूट तर जनता भाजी बाजाराची जागा २ लाख ६४ हजार ७७५ चौरस फूट आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रव्यवहारानंतर महापालिकेने रेडीरेकनर दराप्रमाणे जागेचे पैसे भरण्याचे पत्र मिळवले होते. यानुसार, महापालिकेने महसूल विभागाकडे २६ कोटी रुपयांचा भरणाही केला होता. त्यानंतर जागेचे हस्तांतरण प्रक्रिया सुरू झाली होती. जिथे व्यापारी संकुल उभारण्याची योजना होती. जनता भाजी बाजारातील अनेक गाळे नगरपालिका अस्तित्वात असताना बांधले गेले होते. महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त निमा अरोरा यांनी या व्यावसायिकांना नोटीस बजावली होती. मात्र, शेकडो गाळेधारक निर्णयाविरोधात उभे राहिले. हे प्रकरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे गेले. थोरात यांनी २१ मे २०२१ रोजी जागेच्या हस्तांतरणास स्थगिती दिली, जी नंतरच्या सुनावणीतही कायम राहिली. यानंतर १५ सप्टेंबर रोजी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे सुनावणी झाली. त्यांनी व्यावसायिकांना बाजू मांडण्याची संधी देत पुढील सुनावणीपर्यंत जागेवरील स्थगिती ’जैसे थे’ ठेवली होती. या दरम्यान, शासनाने जागेचे नवीन मूल्य १४८ कोटी रुपये निश्चित केले. महापालिकेने पूर्वी २६ कोटी भरले असले तरी उर्वरित रक्कम भरली नव्हती, ज्यामुळे हे प्रकरण थंडबस्त्यात पडले होते. हस्तांतरित निर्णयावर होणार शिक्कामोर्तब प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरील या सर्व चर्चेनंतर २३ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. आता जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तांतरण कागदपत्रे महापालिका प्रशासनास दिल्यानंतर या महत्त्वाकांक्षी जागेच्या विकासाची पुढील कार्यवाही सुरू होणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:45 am

अकोटला सत्ताधारी भाजप पक्षाचा नगराध्यक्ष कोण?:नगरपालिका निवडणुकीसाठी हालचाली गतिमान‎

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, सध्या निवडणुकीतील गट बांधणीत पक्ष व सर्वपक्षीयांबरोबर अपक्ष देखील चाचपणी करत आहेत अशा परिस्थितीत अजूनही सत्ताधारी भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण? याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्थानिक आमदार भाजपचे असल्यामुळे त्यांनी नगर परिषदेवर दुसऱ्यांदा भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी जोर लावला आहे. तर दुसरीकडे विधानसभेत पडद्याआड राहून कुरघोड्या करणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र यंदा आमदार चांगलाच इंगा दाखवण्याच्या तयारीत असूनस अनेक इच्छुक नगरसेवकांचा पत्ता कट होणार असल्याचे वृत्त आहे. तर इमानेइतबारे पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारीची मागणी केली असून कुणाची लॉटरी लागते याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागून आहे. मुलाखतीचा अहवाल व पक्षाचा गोपनीय सर्वे व आज रात्री कोअर कमिटीची बैठक असून, उद्यापर्यंत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे नाव अधिकृत जाहीर होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. सोशल मीडियावर मात्र नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून ते आजवर अफवांच्या बाजाराला ऊत आलेला दिसत आहे.त्यामुळे अधिकृतरित्या उमेदवारी कुणाला मिळणार याची चर्चा शहरात सुरू आहे. बैठकीत तूर्त अर्ज भरण्याच्या सूचना असल्या तरी अधिकृत उमेदवार कोण? हे देखील जाहीर झाले नाही. अशातच अनेक जण नगराध्यक्षपदाचा उघडपणे दावा करत आहेत. रविवारी त्याबाबतचे अधिकृत घोषणा होऊन चित्र स्पष्ट होईल. मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडण्यासाठी आणि उमेदवार निवडीनंतर इच्छुकाची नाराजी दूर करण्यासाठी मनधरणी राजकीय नेत्यांना करावी लागणार आहे. उमेदवाराच्या राजकीय समीकरणाची चाचपणी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पद आणि नगरसेवकांच्या उमेदवारावरून राजकीय खलबते होत असतानाच प्रमुख नेत्याकडून प्रभागातील मतदारसंख्या किती ? उमेदवाराकडे प्रभागातील राजकीय जातीय समीकरण कसे आहे तो उमेदवार चालतो का ? कोणता मुद्दा त्याला यासाठी फायदेशीर होईल, या विषयापेक्षा त्याची आर्थिक क्षमता आहे का याच विषयावर अधिक चर्चा आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:45 am

सर्व निवडणुका महायुती अखंड एकजुटीने लढणार:केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माध्यमांना माहिती‎

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती अखंड एकजुटीनेच उतरणार असल्याचे स्पष्ट करत केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आयुष मंत्रालय प्रतापराव जाधव यांनी महत्त्वाचे विधान केले. बदलत्या राजकीय घडामोडी, बिहार निवडणूक निकाल आणि जनतेची बदलती मानसिकता पाहता काँग्रेसबाबतचा नाराज भाव अधिक प्रकर्षाने दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. अकोल्यात शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना जाधव म्हणाले, जनतेला काँग्रेस नकोशी झाली आहे. बिहार निवडणुकीतून हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातही याच दिशेने परिणाम दिसतील. राज्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुका महायुतीचे सारे घटक पक्ष एकत्र येऊनच लढणार असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. महायुतीचे तीन प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त बैठकीत आगामी सर्व निवडणुका एकजुटीनेच लढवण्याचा निर्णय घेतल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यामुळे महायुतीतील कोणताही घटक पक्ष स्वतंत्रपणे उमेदवार उभा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम दिसून येत असल्याचे निदर्शनास जाताच जाधव यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला महायुतीची भूमिका एकच, निवडणुका एकत्र लढायच्या हीच आहे. काही ठिकाणी मैत्रिपूर्ण सामंजस्याने लढती होतील या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्याची तयारी पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते आधीपासून करत असतात. त्यामुळे काही ठिकाणी शिंदे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) किंवा काँग्रेस यांच्याशी स्थानिक पातळीवर युती करुन या निवडणुका मैत्रिपूर्ण अशा लढल्या जातील, मात्र शेवटी ते महायुतीचे उमेदवार म्हणूनच गणले जातील, असेही जाधव यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:44 am

बालदिनानिमित्त स्वाक्षरी अभियानानिमित्त जनजागृती‎:बालकांचे हक्क, स्वातंत्र्य या मूल्यांची जपणूक आवश्यक- जिल्हाधिकारी

बाल दिनानिमित्त बालकांची हक्क व अधिकार याबाबत जनजागृतीसाठी महिला व बालविकास विभागातर्फे स्वाक्षरी अभियान जिल्हाधिकारी कार्यालयात राबवण्यात आले.बालकांसाठी समाजात, परिसरात सुरक्षित, आनंददायी वातावरण निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. बालकांचे हक्क, स्वातंत्र्य या मूल्यांची जपणूक आवश्यक आहे. हे करत असतानाचा त्यांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी स्वाक्षरी करून अभियानाचा शुभारंभ केला. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यक्रम अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसतकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी राजश्री कोलखेडे, अॅड. संजय सेंगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रश्मी बन्सल, अँड अनिता गुरव, सुनील लाडुलकर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:44 am

बालकांमध्ये वैचारिक‎क्षमतेची सांगड घाला‎:सत्यानंद नखोद; सहकार विद्या मंदिरात बालक दिन

आजचा बालका हास्य विसरलेला आहे अभ्यास आणि खडतर मेहनत यामध्ये तो गुंतून गेलेला आहे. त्यासाठी कुठेतरी बालकांच्या चेहऱ्यावर हास्य आणता आले पाहिजे. जेणेकरून त्यांना अभ्यास, कला, क्रीडा व वैचारिक क्षमतेची सांगड घालता येईल, असे मत मुख्याध्यापक सत्यानंद नखोद यांनी व्यक्त केले. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त सहकार विद्या मंदीर साखरखेर्डा येथे शुक्रवारी १४ नोव्हेंबरला बालक दिन साजरा केला. या वेळी नखोद बोलत होते. बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक , बुलडाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कोमल झंवर त्यांच्या प्रेरणेतून व बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष सुकेश झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम साजरा केला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाधान जाधव व प्रमुख मार्गदर्शिका म्हणून अनुराधा बळी या होत्या. बळी यांनी विद्यार्थ्यांना बालक दिनाचे महत्व व बालक दिन का साजरा केला जातो, याची माहिती दिली. या प्रसंगी दीपक आखरे यांनी संगीतमय वातावरण निर्मिती केली या कार्यक्रम प्रसंगी शिक्षकांनी, शिक्षिकांनी हास्य नाटकाची मेजवानी बहाल केली. त्यात कांचन शेकोकर, ज्ञानेश्वर पडघान, सुजित कुमार लहाने , स्वरूपा भगत , जयश्री पवार, पूजा सुरूसे , सुनील गायकवाड , छाया कळस्कर , नारायण दानवे व दीपक आखरे यांनी विविध भूमिका केल्या. सुनील गायकवाड व सुमित कुमार लहाने यांनी वाघ्या मुरळी हा भारुड कार्यक्रम सादर केला. सूत्रसंचालन केतन बोरकर यांनी केले.कार्यक्रमासाठी सहकार विद्या मंदिर शाळेचे शिक्षक, शिक्षिकांनी मोलाची भूमिका केली.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:40 am

खेळाडूंनी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज- ॲड. देशपांडे:राज्यस्तर शालेय फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात अमरावती तृतीय‎

ज्या खेळाडूंनी स्पर्धेत अजिंक्यपद प्राप्त केलेले आहे. त्यांनी या पुढील आयुष्यात यावर समाधान न मानता अधिक जोमाने प्रयत्न करावे. ज्यामुळे महाराष्ट्र व पर्यायाने भारताला क्रीडा क्षेत्रात लौकीक प्राप्त होऊ शकेल. तसेच ज्या खेळाडूंनी स्पर्धेत विजय मिळवला त्यांनी आपले क्रीडा कौशल्य गुण वाढवण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करावे, तसेच पराभूत खेळाडूंनी नवीन संधी शोधावी, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देशपांडे यांनी केले. तसेच महाराष्ट्राची निवड होणाऱ्या १४ वर्ष वयोगटातील मुले व मुलीच्या संघास राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा क्रीडा विभागाच्या यजमानपदाखाली झालेल्या मुलींच्या स्पर्धेत यंदा अमरावतीने मुलींच्या गटात उत्तम कामगिरी करताना तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या रोमांचक सामन्यात नाशिकला पराभूत करून कांस्यपदक पटकावले. स्पर्धेचे आयोजन १३ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत सायंस्कोर मैदान, पोलिस फुटबॉल क्रीडांगण येथे केले होते. राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्रातील आठही विभागातील १६ मुले व मुलींचे संघ असे एकूण ३०० मुले व मुली, पंच, सामनाधिकारी, निवड समिती सदस्य, संघ व्यवस्थापक स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत मुले व मुलींचे सर्व सामने सकाळ व दुपारच्या सत्रात घेण्यात आले. तत्पूर्वी, स्पर्धेच्या समारंभाला कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना उपाध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, अमरावती फुटबॉल संघटना सचिव सुशील सुर्वे, हरिहरनाथ मिश्रा, सुमित पाटील, जिवन मोहोड, सूरज दुबे, सार्थक खोरगडे उपस्थित होते. या वेळी १४ वर्ष वयोगटातील मुलींनी कोल्हापूर विभागाने पुणे संघावर अंतिम सामन्यात ४-० अशा फरकाने गोल करून अजिंक्यपद पटकावले. तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात अमरावती विभागाने नाशिक विभागाला पराभूत करून तृतीय क्रमांक मिळवला. या वेळी स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या प्रथम तीन संघांना मुले व मुली स्वतंत्र या प्रमाणे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून सुशील सुर्वे, हरिहरनाथ मिश्रा, प्रतिक बुदेले, आकाश टाले, विकी ढाके, गौरी भलावी, रोशन पांडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांनी केले, तर आभार संजय कथळकर यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सलीम शेख, अनिल इंगळे, राजू वडते, प्रवीण टेकाडे, संतोष विघ्ने, त्रिवेणी बांते, वैशाली इंगळे, अनुप वानखडे, प्रफुल्ल डांगे, स्वप्निल चांदेकर यांनी परिश्रम घेतले. राज्यस्तरीय स्पर्धेतून निवड झालेल्या व महाराष्ट्रातील ८ ही विभागातील विभागीय स्पर्धेतील निवड खेळाडूंची एकत्रीत निवड चाचणी पोलिस फुटबॉल क्रीडांगण अमरावती येथे आयोजित करण्यात आली. ही राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा झारखंड येथे आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी होणार आहे. याकरिता राज्यस्तरीय निवड चाचणीतून तिन्ही उपस्थित निवड समिती सदस्यांमार्फत महाराष्ट्राच्या १४ वर्ष आतील मुले व मुलींच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ निवड चाचणी

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:30 am

विद्यार्थ्यांनी दादासाहेबांचे कार्य पुढे न्यावे- डॉ. कमलाकर पायस:डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची रा. सू. गवई स्मारकाला भेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी माजी राज्यपाल रा. सू. (दादासाहेब) गवई यांच्या स्मारकाला शैक्षणिक भेट दिली. विद्यार्थ्यांनी या वेळी स्मारकातील दादासाहेब गवई यांचे जीवनचरित्र, त्यांची विधान परिषद, संसदेतील भाषणे तसेच त्यांची इतर अनेक भाषणे इयर फोनद्वारे ऐकून घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर पायस यांनी दादासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, की विद्यार्थ्यांनी दादासाहेबांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्य पुढे न्यावे, त्यांच्या विचारांना जीवनात प्रगती करण्यासाठी वापरावे, असे आवाहनही केले. तसेच प्रा. पी. आर. एस. राव यांनी दादासाहेबांचे कार्य, त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्य तसेच राजकीय जीवनाविषयी माहिती दिली. या वेळी स्मारकाचे संपदा व्यवस्थापक धम्मदीप गवई, प्रा. पी. आर. एस. राव, डॉ. श्याम तंतरपाळे, डॉ. सुनील कुमार, डॉ. शुद्धोधन कांबळे, डॉ. प्रदीप अंबोरे, डॉ. प्रकाश म्हस्के, डॉ. राजेश देशमुख, डॉ. प्रशांत खेडकर, प्रा. जी. एच. पांडे, डॉ. एस. बी. सांगोले, प्रा. दीपाली पडोळे, प्रा. प्रकाश बोरकर, प्रा. अनिल धोटे, प्रा. प्रवीण विधाते, प्रा. शंकर लाहोटी, प्रा. डोईफोडे, प्रा. हर्षवर्धन देशमुख, डॉ. ज्ञानेश्वर भगत, डॉ. अनिल पाचकुडके, प्रा. सुभाष मुंडे, प्रा. नवलकर, प्रा. रुद्रा चोपकर, प्रा. ज्योती टाले, प्रा. मेघा चिमणकर, प्रा. स्वप्नील मानकर, प्रा. एन. डी. अढाऊ, प्रा. महेश बनसोड, प्रा. हेमंत सावळे, प्रा. दीपाली गवई, भाग्यश्री वानखडे, सागर शिरसाट, रोशन वैद्य तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:29 am

घरफोडी अन् चोऱ्या करणारा ‘राजा’ गुन्हे शाखेच्या जाळ्यात:पोलिसांनी जप्त केला 2 लाख 40 हजारांचा मुद्देमाल‎

शहरात अलीकडे दुकानांचे शटर उचकाटून चोरीच्या घटनामध्ये वाढ होत आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेकडून चोरट्याचा शोध सुरू करण्यात आला होता. दरम्यान गुन्हे शाखेने शनिवारी (दि. १६) एका अट्टल चोरट्याला अटक केली. त्याचे नाव ‘राजा’ आहे. त्याने पोलिसांना सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. शेख राजा शेख बाबा (२१, रा. अन्सारनगर अमरावती, ह. मु. यासीनप्लॉट, बडा ताजबाग, शक्करदरा, नागपूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील अख्तर हुसेन अहमद हुसेन (रा. पाटीपुरा) यांनी तक्रार दिली की, त्यांचे टिपू सुलतान मार्केटमध्ये हॉटेल आहे. सदर हॉटेलचे शटर वाकवून अज्ञात चोरट्याने आतमधील रोख रक्कम व टॅब चोरून नेला आहे. त्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द १२ नोव्हेंबरला गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण व त्यांचे पथक यांनी सुरू केला. शहरात यापूर्वीही अशा प्रकारच्या चोऱ्या झाल्या होत्या, त्यामुळे गुन्हे शाखेचे पथक सदर चोरट्याचा कसून शोध घेत होते. दरम्यान शुक्रवारी रात्री येथील एका मैदान परिसरात एक संशयित चोरटा आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मैदानावर जावून त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचे नाव शेख राजा शेख बाबा असे सांगितले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने हॉटेलमध्ये चोरी केल्याचे सांगितले. यावेळी शहर कोतवाली हद्दीतील दोन, बडनेरा आणि राजापेठ हद्दीतील प्रत्येकी एक आणि नागपूर शहरातील तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक असे एकूण सहा गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी एक प्रवासी ऑटो रिक्षा, एक दुचाकी, एक मोबाईल, एक टॅब, ७ हजार ६०० रुपयांची रोख तसेच चोरी केलेले सिगारेट व बिडीबंडल असा एकूण २ लाख ४० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शेख राजा याने प्रवासी ऑटो आणि दुचाकीसुद्धा चोरीच्या पैशातून खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण, एपीआय मनीष वाकोडे व त्यांच्या पथकाने केली आहे. रात्री ऑटो चालवून फोडायचा बंद दुकाने शेख राजा शेख बाबा हा सराईत चोरटा आहे. तो काही दिवसांपूर्वी नागपूरातून अमरावतीत राहायला आला आहे. तो प्रवासी ऑटो चालवण्यासाठी रात्रीदरम्यान बाहेर पडायचा. अमरावती ते बडनेरा दरम्यान रात्रीच्या वेळी तो ऑटो चालवत होता. या दरम्यान अनेकदा बंद दुकान त्याच्या नजरेस पडल्यानंतर ते फोडून पोबारा ठोकायचा, असा त्याचा चोरीचा फंडा होता, अशी माहिती पोलिस तपासामध्ये समोर आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:28 am

तिवसातील अतिवृष्टीग्रस्तांना भरपाई द्यावी:पाच दिवसांत निर्णय न झाल्यास ‘चुना-लावा’ आंदोलनाचा इशारा

तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसतर्फे नायब तहसीलदार नरेंद्र कुरळकर यांना निवेदन देण्यात आले. सततच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा. या मुख्य हेतूने हे निवेदन देण्यात आले. मागील जुलै ते सप्टेंबर या काळात तिवसा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कपाशी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने जाहीर केलेली हेक्टरी ८ हजार ५०० रुपयांची मदत अद्याप न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झाले आहे. काहींना ‘एक पोत’ एवढीही आवक मिळालेली नाही. कपाशी पिकामध्ये बोंडसडी मोठ्या प्रमाणात वाढल्याने कापसाची गुणवत्ता घटली आहे. दरम्यान नाफेड व सीसीआय संस्था पिकाची गुणवत्ता तपासूनच खरेदी करतात. परंतु, सततच्या पावसामुळेच गुणवत्तेवर परिणाम झाल्याने अशा निकषांनुसार खरेदी झाल्यास बहुसंख्य शेतकरी वंचित राहतील. त्यामुळे यावर्षी सर्व गुणवत्तेचे निकष रद्द करून सरसकट शेतकऱ्यांकडून सोयाबीन आणि कापूस हमीभावाने खरेदी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. रब्बी हंगामातील हरभरा व गहू पेरणीसाठी शासनाने जाहीर केलेली हेक्टरी १०,००० रुपयांची मदतही अद्याप मिळालेली नाही. या मदतीअभावी रब्बी पिकांची पेरणीही अडचणीत आली आहे. तसेच घरकुल योजनेतील प्रलंबित हप्ते तातडीने जमा करण्यात यावे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त सोयाबीन व कपाशी पिकांसाठी जाहीर केलेली हेक्टरी ८,५०० मदत तातडीने मिळावी. रब्बी हंगामातील हरभरा, गहू पेरणीसाठी जाहीर केलेली हेक्टरी १०,००० मदत त्वरीत देण्यात यावी. नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी करताना कोणतीही आर्द्रता, गुणवत्ता अट लागू न करता सरसकट खरेदी करावी. सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांना तातडीने सुरुवात करावी. कोणतीही अट न ठेवता खरेदी करावी. घरकुल लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते तातडीने जमा करावेत. शासनाने या मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील पाच दिवसांत तहसील कार्यालयात चुना लावा आंदोलन' छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या वेळी जसबीर ठाकूर, सरपंच सूरज धुमणखेळे, उपसरपंच प्रशांत प्रधान, प्रशांत कांबळे, आशिष बायस्कर, अॅड. विकास तुरकाणे, लक्ष्मीकांत पाचघरे, रघुवर्य पुनसे, सुधाकर मानापुरे, गौरव बायस्कर, स्वप्नील तुरकाणे, अंकुश बायस्कर, विवेक ठाकरे, सुशील तांतरपाडे, सूरज चौधरी, सतीश खरकाडे आदी शेतकरी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:27 am

दर्यापुरात नगराध्यक्षपदासाठी 1, नगरसेवकसाठी 19 अर्ज:इच्छुकांना ऐनवेळी उमेदवारी‎ नाकारल्याने काँग्रेसमध्ये धुसफूस‎

राजकीयदृष्ट्या नेहमीच चर्चेत असलेल्या दर्यापूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेला दमदार सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, शनिवारी सहाव्या दिवसअखेर नगराध्यक्षपद पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला तर नगरसेवक पदासाठी एकूण २१ अर्ज दाखल झाले आहेत. शनिवारपर्यंत ऑनलाइन ९० उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. परंतु प्रत्यक्षात प्रशासनाकडे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी मोजकेच अर्ज प्राप्त झाले आहे. स्थानिक पातळीवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नाही. दुसरीकडे काही पक्षांची एकत्र लढण्याची तयारी झाली असली तरी अंतिम जागा वाटपाचा तिढा कायम आहे. इतर राजकीय पक्षांनीही अद्याप उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख सोमवार, १७ नोव्हेंबर आहे. त्यानंतर १८ नोव्हेंबरला नामांकन अर्जांची छाननी होणार आहे. स्थानिक पातळीवर समीकरणे बदलताना दिसत आहेत. अनेक इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली असली, तरी कोणाला तिकीट मिळेल याविषयी गुप्तता कायम आहे. तर दुसरीकडे ही निवडणूक चुरशीची होणार असून राजकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे. प्रत्येक पक्षाची रणनीती गुप्तच नगर परिषद निवडणूक ही केवळ राजकीय पक्षांची नव्हे तर लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांत मैत्रीपूर्ण संबंधांवर आधारित असते. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आपली रणनीती गुप्त ठेवली आहे. राज्यात सध्या महायुतीचे सरकार असले तरी महाविकास आघाडी आणि इतर स्थानिक राजकीय पक्ष निवडणूक किती गांभीर्याने लढवतात, हे नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:26 am

नगरपरिषदेचा महासंग्राम:भाजप 9 ठिकाणी स्वबळावर,सेना एकाकी‎, सांगोल्याचे ठरेना तर कुर्डुवाडी व करमाळ्यात राष्ट्रवादीसोबत समझोता‎

भाजप जिल्ह्यातील ११ नगरपालिका आणि एक नगरपंचायत अशा १२ पालिका पक्षाच्या चिन्हावर लढवणार आहे. नगराध्यक्षपदाचे सर्व उमेदवार निश्चित झाले असून सोमवारी नावे जाहीर होतील. करमाळ्यातील शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांच्या राजीनाम्याविषयी माहिती नाही, पण बागल भाजपात येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूरमध्ये दिली. पालकमंत्री गोरे हे शनिवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, संगणकीय प्रणालीद्वारे उमेदवारी अर्ज ऑनलाइन दाखल करण्यात अडचणी येत असल्याने रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येतील, असे निवडणूक कार्यालयाने कळवले आहे. पालकमंत्री म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व १२ ठिकाणी भाजप पक्ष चिन्हावर लढवणार आहे. सर्व ठिकाणचे उमेदवार निश्चित झाले आहेत. सर्व ठिकाणी भाजपचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. गजत तेथे मित्र पक्षांची चर्चा केली आहे. या वेळी आ. समाधान अवताडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते. प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील १२ नगरपालिकांमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु करमाळा, कुर्डुवाडी येथे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत (अजित पवार) युती करुन निवडणुकीची तयारी चालवली आहे. सांगोल्यात अजून भाजपची बोलणीच सुरू आहे. शेकापला सोबत घेण्याचा प्रयत्नही सुरू असला तरी आघाडीच्या चिन्हावर भाजप लढण्यास इच्छुक नाही. त्यामुळे सांगोल्यात दीपक साळुंखे पाटील यांची भूमिका काय राहते, यावर पुढील दिशा अवलंबून आहे. परंतु शिंदेसेना युतीत एकाकी दिसून येत आहे. विरोधी महाविकास आघाडीने बहुतांश ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक न लढवता आघाडीकडून लढण्याची तयारी केली आहे. काँग्रेस जिल्ह्यात ७ पालिकांमध्ये चिन्हावर उमेदवार रिंगणात उतरवत आहे. कुर्डुवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना (शिंदे) एकत्र येतील. करमाळ्यातही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (शिंदे) एकत्र येतील. अकलूजमधील सस्पेन्स अजून कायम आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात सर्वत्र भाजप चिन्हावर उमेदवार निवडणुकीत उतरवणार, असे सांगितले आहे. आवश्यक तेथे इतरांशी चर्चेची गरज नाही, तेथे स्वबळावरच निवडणुक लढवत आहोत, असे सांगितले. परंतु तरीही अजून कोठे स्वबळ व कुठे महायुती हे सांगितले नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस आघाडीची ताकद असली तरी सात ठिकाणी काँग्रेसने स्वबळाची तर राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आघाडीची तयारी चालवली आहे. पक्ष नेतृत्वाने अजून राजकीय पत्ते उघड केले नाहीत. याउलट राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसने अकलूजमध्ये स्वबळाची भाषा वापरत पद्मजादेवी मोहिते पाटील यांना पक्षाचे कोरे ए. बी. फॉर्म दिले आहेत. प्रतिनिधी | वाशिंबे | पांडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. करमाळा शहरात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत सामूहिक राजीनाम्याची घोषणा केली. जयवंतराव जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केल्याच्या निषेधार्थ शिंदेसेनेचे दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी राजीनामास्त्र उगारले आहे. ५५ शाखाप्रमुखांनी सामूहिक राजीनामे जाहीर केले आहेत. तसेच २० हजार शिवसैनिक त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा पोस्टाद्वारे पाठवणार आहेत, असे समजते. शनिवारी (दि.१५) करमाळा येथे एकत्र बैठक घेत करमाळा तालुक्यातील ५५ शाखाप्रमुख व कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते दिग्विजय बागल यांना भेटून शिवसेनेच्या सदस्यात्वाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करणार असल्याची माहिती उपस्थित कार्यकर्त्यांनी दिली. निवडणूक जवळ आली असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षांतर्गत राजकीय नाराजी नाट्यही समोर येत आहे. बैठकीला श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश निळ, आशिष गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुलदीप पाटील, माजी संचालक रंगनाथ शिंदे, नवनाथ बदर, रावगावचे सरपंच संदीप शेळके, राणा वाघमारे, विजयसिंह निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता शिंदेसेनेत बागल गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्यामुळे पक्षाला नगरपरिषद निवडणूक आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षातील नेत्यांमधील अंतर्गत वाद आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे पक्षाची संघटनात्मक शक्ती घटून विरोधकांना लाभ होऊ शकतो. ^ शिवसेनेचे (शिंदे) सचिव व पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना तालुक्यातील २० हजार शिवसैनिक व ५५ शाखाप्रमुखांचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पोस्टाने पाठवण्यात येणार आहे. जुन्या व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना डावलण्यात येत आहे. यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असून त्यांनी बैठकीत हा निर्णय घेतला आहे. - दिग्विजय बागल, नेते, शिवसेना (शिंदे), करमाळा. पुढे काय? विरोधी आघाडीत एकवाक्यता नाही भाजप पंढरपूर, जिल्हा व राज्यातही मोठी शक्ती आहे, त्यामुळे भाजप सक्षमपणे ही निवडणूक लढवेल आणि पंढरपूरचा नगराध्यक्ष हा कमळ चिन्हावरच होईल, असा विश्वास व्यक्त करत पालकमंत्र्यांनी विरोधी आघाडीवर टीका केली. वेगवेगळ्या विचारांची लोकं एकत्र येतात, प्रत्येकाचा वेगळा स्वार्थ आहे, प्रत्येकाची वेगळी भूमिका आहे, प्रत्येकजण स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय. एकवाक्यता नसल्याने अशा घटना घडतात. सैनिकांत नाराजी, राजीनाम्याचा निर्णय

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:11 am

बालदिन विशेष:दत्तकला संकुलात 570 झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल, स्वामी चिंचोली येथे बालदिन सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला असून यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध गुणदर्शनात्मक व क्रियाशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहिला दिवस (१० नोव्हेंबर) ‘एक पेड माँ के नाम' या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने दत्तकला संकुलात ५७० झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. याच दिवशी स्पर्धेत वि‌द्यार्थ्यांनी चमकदार सहभाग नोंदवला. दुसरा दिवस (११ नोव्हेंबर) सायन्स इन डे टू लाईफ या विषयावर उपक्रम घेण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये शिक्षकांनी स्वतः विविध पात्रातून दैनंदिन जीवनातील विज्ञानाच्या उपयोगाची उदाहरणे वि‌द्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिली व अनुभवली. तिसरा दिवस (१२ नोव्हेंबर) फन् वित मॅथ या उपक्रमांतर्गत गणित विषयावरील खेळ, कोडी व रोचक क्रियाकलापांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गणिताचा भीतीदायक विषय किती मजेशीर असू शकतो हे अनुभवले. चौथा दिवस (१३ नोव्हेंबर) या दिवशी विद्यार्थ्यांनी स्टोरी अशा उत्कृष्ट नाट्यरूप सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:09 am

मॅरेथॉनमध्ये धावले 250 विद्यार्थी, आरोग्याविषयी महत्व अधोरेखित:मंगळवेढ्यात माणगंगा परिवारच्यावतीने केले होते आयोजन‎

मंगळवेढा येथे माणगंगा परिवार अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने वर्धापन दिन व बालदिनानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा पडल्या पार पडल्या. माणगंगा परिवार अर्बन कॉ- ऑपरेटिव्ह सोसायटी लि. शाखा मंगळवेढा यांचा यशस्वी तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन इंगोले व संस्थेच्या चेअरमन अर्चनाताई इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली १४ नोव्हेंबर बालदिन रोजी माणगंगा परिवार मॅरेथॉन २०२५ ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ क्रीडाशिक्षक रामभाऊ दत्तू, वारी परिवाराचे प्रमुख सतीश दत्तू, माणगंगाचे संचालक विवेक घाडगे, विजय वाघमोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय मुढे आदीजण उपस्थित होते. मंगळवेढा तालुका व पंचक्रोशीतील जवळपास २५० हून अधिक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी चिमुकल्या स्पर्धकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आरोग्य, व्यायाम व तंदुरुस्तीचा महत्वाचा संदेश समाजापर्यंत पोहचावला. आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असताना, या संस्कार केदार, जीनकुमार लवटे, अर्णव माने, आदेश देशमुख, रूपाली इंगळे, अल्फी मकानदार, अनुजा हजारे, असलीमा मुलानी, अवनी टाकणे, अर्पिता माळी, पंकजा बुरांडे, पूर्वी बिनवडे. मॅरेथॉनच्या माध्यमातून मुलांनी व्यायामाचे आणि आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाचा प्रशस्तीपत्रक व गुलाब देऊन सन्मान करण्यात आला. या दौडची सुरुवात माणगंगा परिवार अर्बन पतसंस्थेपासून करण्यात आली. ही दौड शिवप्रेमी चौक, चोखामेळा चौक, मुरलीधर चौक, जुने डीवायएसपी ऑफिस मार्गे शिवतीर्थावर आली. स्पर्धेचा समारोप शिवतीर्थ, छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास वंदन करून करण्यात आला. ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वारी परिवार, शिव प्रतिष्ठान, अधिकारी व कर्मचारीवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विजेते मुलींचे नावे विजेते- विद्यार्थ्याचे नाव प्रथम- रंजना कोळेकर द्वितीय- भाग्यश्री लवटे तृतीय- काजल भोसले विजेते विद्यार्थ्यांची नावे विजेते- विद्यार्थ्याचे नाव प्रथम- विराज धुमाळ द्वितीय - बिलाल शेख तृतीय - दीपक दुधाळ

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:09 am

समाधान थोरात यांची वर्ल्ड हाफ आयर्नमॅन चॅम्पियनशिपसाठी निवड:गोवा येथील हाफ आयर्नमॅन स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी‎

पंढरपूर सायकलर्स क्लबचे सदस्य आणि पॅरा कमांडो समाधान थोरात यांनी यंदाच्या गोवा हाफ आयर्नमॅन ७०.३ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत पंढरपूर तालुक्याचा मान उंचावला आहे. पहिल्याच पदार्पणात त्यांनी ही कठीण त्रिस्पर्धा केवळ ५ तास २८ मिनिटांत पूर्ण करत दमदार कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत स्पर्धकांना १.९ कि.मी. पोहणे, ९० कि.मी. सायकलिंग आणि २१.२ कि.मी. धावणे असा एकूण टप्पा ८ तास ३०मिनिटांत पूर्ण करावा लागतो. त्यातही ५ तास ३० मिनिटांच्या आत स्पर्धा पूर्ण केल्यास वर्ल्ड हाफ आयर्नमॅन चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळते. समाधान थोरात यांनी पहिल्याच प्रयत्नात ही पात्रता मिळवत आपल्या जिद्दीचे व मेहनतीचे सर्वोत्तम उदाहरण साकारले. यापूर्वी त्यांनी सायकलिंगमधील नामांकित डेक्कन क्लिप हॅंगर- पुणे टू गोवा (६४९ किमी) ही स्पर्धाही केवळ ३५ तासांत पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली होती. दोन भिन्न आणि अत्यंत आव्हानात्मक स्पर्धांमध्ये मिळवलेल्या या दुहेरी यशाबद्दल समाधान थोरात यांचे विविध स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या या पराक्रमाबद्दल पंढरपूर सायकलर्स क्लबच्या वतीने समाधान थोरात यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला पंढरपूर सायकलर्स क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:07 am

ख्वाजा सुफल मुलूक चिश्ती बाबांच्या उरुसास आजपासून होणार सुरुवात:हैद्रा यात्रेसाठी चेअरमन एमडी रफिक शिराजोद्दीन यांचा नियोजनासाठी पुढाकार‎

हैद्रा येथील सुप्रसिद्ध हिंदू- मुस्लिमांचे ऐक्याच्या प्रतीक असलेले ख्वाजा सैफुल मुलूक चिस्ती कादरी बाबांच्या उरुसास आजपासून उत्साहात प्रारंभ होत आहे. दरम्यान आज दि, १६ नोव्हेंबर रविवारी सकाळी कर्नाटक येथील करजगी गावचे पाटील यांच्या घरातून मानाचे संधल निघणार आहे. या क्षणाचे औत्सुक्य करजगी व हैद्रा येथील भक्तांना लागले असून याचे भक्तांनी आतुरतेने वाट पाहत आहेत. रविवारी रात्री बसवेश्वर नाट्य संघ हैद्रा यांचे कौटुंबिक नाटक सादर करण्यात येणार आहे. भिमविलास अर्थ - किचक वध ( बैलाट,आट) हे सुंदर कन्नड नाटकाचे प्रयोग सादर करण्यात येणार आहे. सोमवार दि, १७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वा चिराग हा दिव्यांचा तेजोमय असा सुंदर धार्मिक कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यकमात गावातील अबाल वृद्ध मुजावर या लोकांचा समावेश असतो. रात्री दिल्ली येथील इरम चिस्ती व राजस्थानचे नौशाद सोहळा अजमेर यांचे कव्वाली मुकाबला होणार असून यासाठी जय्यत तयारी केली आहे. कव्वाली मुकाबला बघण्यासाठी जिल्हयातील तमाम भक्तांना उत्सुकता वाटत आहे, यासाठी स्टेजसह इतर बाबींची जोरदार तयारी दर्गा कमिटीच्या वतीने केली आहे. मंगळवार दि, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी महाराष्ट्रातून आलेल्या तमाम भक्तांना जीआरत तबरुक हा महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार असून यात मलिदा, केळी, चुरमुरे, गोड भात असणार आहे. भाविकांच्या जीवनात अति आनंदाचा क्षण ^हैद्रा येथील ख्वाजा सैफुल मुलूक चिस्ती कादरी बाबांच्या उरुसास अति उत्साहाने प्रारंभ होत आहे. येथे सर्वधर्मीय समाजबांधव जात, पात, धर्म विसरून बाबांच्या सानिध्यात तल्लीन होतात. केवळ श्रद्धाभावनेने आलेले भाविक भयमुक्त, दारिद्रय मुक्त, पीडा मुक्त होऊन बाबांच्या पावन नगरीत दर्शनाने तृप्त होतात. हे एक प्रत्येक भाविकांच्या जीवनातील अति आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे दर्गा ट्रस्टीच्या वतीने पूर्ण दक्षता घेतली आहे. रफिक मुजावर, चेअरमन

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:07 am

झाडी येथील पाझर तलाव सांडव्यातील मुरूमाची चोरी:शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष‎

गौडगाव झाडी येथील पाझर तलावाच्या सांडव्यातील मुरूम बेकायदेशीररित्या चोरी केल्याने तलावातील जलसाठा कमी झाला, यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. शेतकरी अरविंद पाटील यांनी जलसंपदा विभागाकडे तक्रार करुनही अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. मुरूम उत्खनन व चोरी करणाऱ्यांना यातून अप्रत्यक्ष पाठींबा दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. माढा तालुक्यातील मुरूम उत्खनन प्रकरण राज्यभर गाजले असताना बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तक्रार करुनही तहसील व जलसंधारण विभागाकडून चौकशी करण्यात आलेली नाही. याउलट धमकावण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप होत आहे. पाझर तलावाची दुरुस्ती करून सांडव्यामधील उपसा केलेला मुरूम भरावा. तलावात पाणीसाठा होईल. पाहणी करत कार्यवाही ^पाझर तलावाच्या सांडव्यातील मुरूम उचलल्याची तक्रार अरविंद पाटील यांच्याकडून आली आहे. वाटर फ्रंट कंपनीकडून त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आल्याची माहिती आहे. पाहणी व चौकशी करून कार्यवाही करण्यात येणार आहे. सचिन किरनाळे, अभियंता, जलसंपदा विभाग, बार्शी. ^बार्शी - तुळजापूर रोडजवळील क्षेत्रात झाडी पाझर तलावाच्या खालील क्षेत्रात माझी जमीन आहे. या तलावातील सांडव्याचा मुरूम बेकायदेशीरपणे उचलला आहे. याबाबत तक्रार केली परंतु अधिकाऱ्यांनी पावले उचलली नाहीत. सांडवा फोडल्यामुळे तलावात पाणी राहिले नसून आमच्या विहिरीचे पाणीही कमी झाले. अरविंद पाटील, शेतकरी, झाडी.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:06 am

महिलांनी प्रथम स्वतः च्या आरोग्याची काळजी घ्यावी:पुणे विभाग प्रमुख प्रा.मीनाक्षी जगदाळे यांचे प्रतिपादन‎

स्त्री ही संपूर्ण समाजाच्या आरोग्याची जननी असून तिचे आरोग्य मजबूत असेल तर कुटुंब, समाज आणि पुढील पिढी सर्वच सशक्त राहते.त्यासाठी महिलांनी स्वतःकडे शेवटी पाहण्याची सवय बदलून ‘मी प्रथम निरोगी’ हा विचार स्वीकारला पाहिजे, असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेड पुणे विभाग प्रमुख प्रा. मीनाक्षी जगदाळे यांनी केलं. येथे बाल दिनाच्या निमित्ताने विवा हॉस्पिटल व जिजाऊ ब्रिगेड पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी लहान मुलांकडून केक कापून बालदिन साजरा करण्यात आला. या शिबिरामध्ये महिलांच्या हिमोग्लोबिन, थायरॉइड, ब्लड शुगर अशा चाचण्यां करण्यात आल्या. त्याचा लाभ ५० महिलांनी घेतला. तसेच शिबिरात विवा हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रीती गांधी यांनी महिलांना येणाऱ्या दैनंदिन आरोग्य समस्या, गर्भाशयाचे विकार आदी विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच महिलांना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून सांगत मासिक पाळीतील समस्या, प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतरची काळजी याबाबतही मार्गदर्शन केले.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:06 am

सावित्रीबाई फुले विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारली देवता:महापुरूषांची वेशभूषा, पंडित नेहरूच्या विचारांची दिली विद्यार्थ्यांना माहिती‎

वैराग येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेमध्ये बालदिन दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मुलांना प्रिय असलेल्या नेहरूजींच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी खास पद्धतीने साजरा केला जातो. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती सुशीला दिंडोरे व श्रीमती रेखाताई भूमकर यांच्या हस्ते नेहरूजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले आहे. त्यानंतर मुख्याध्यापकांनी नेहरूजींचे बालप्रेम, देशासाठीचे योगदान आणि त्यांच्या विचारांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. बालदिनानिमित्त अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून या कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदविला. या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज, टिपू सुलतान, ताराराणी येसूबाई, महाराणी साहेब, राणी लक्ष्मीबाई ही पात्रे कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी देव देवतांची वेशभूषा केली. बालवाडीतील छोट्या मुलांनी विठुराया आणि रुक्मिणी तसेच दिंडीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भारतमाता सैनिक, मावळे, आदिवासी लोकांचा पोशाख, राजस्थानी, महाराष्ट्रीयन, गुजराती लोकांचा पोशाख अशा विविध राज्यातील लोकांचा पोशाख परिधान करून मुले व मुली कार्यक्रमांमध्ये सहभागी होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:05 am

उसाला 4 हजार रुपये दरासाठी उसाची वाहतूक रोख आंदोलन

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्याप उसाचा दर जाहीर केला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टनाला चार हजार रुपयांच्या दराच्या मागणीसाठी माळशिरस तालुक्यातील साखर कारखान्यांना होणारी ऊस वाहतूक रोखण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी पुणे पंढरपूर व पिलीव अकलूज रस्त्यावरील निमगाव पाटी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील जवळपास सर्वच साखर कारखान्यानी दर जाहीर न करताच गळित हंगाम सुरू केला आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला असून काही कारखान्यांनी पहिला हप्ताही देण्यास सुरुवात केली आहे. माळशिरस तालुक्यातील सहकारमहर्षी, श्री शंकर, श्री पांडुरंग, दी सासवड माळी शुगर, ओमकार शुगर आदी साखर कारखान्यांनी अजूनही दर निश्चित केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत आहे. ऊस दर निश्चित झाल्याशिवाय कोणत्याही कारखान्याला ऊस वाहतूक होऊ देणार नाही, असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे ऊस वाहतूक रोखण्याचे आंदोलन सुरू करण्यात आले. यामुळे रोडवर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:04 am

मंगळवेढा परिसरात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी स्कॉर्पिओत पकडली तलवार:तीन आरोपींना अटक, न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलिस कोठडी‎

येथील नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून शहरात येणाऱ्या वाहनांची स्थिर सर्वेक्षण पथकाकडून कसून चौकशी केली जात आहे. मंगळवेढा शहराच्या सीमेवर जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर स्थिर सर्वेक्षण पथक तैनात करण्यात आले आहे. यावेळी स्थिर सर्वेक्षण पथकाची पाहणी करण्यासाठी पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे उपस्थित होते. नगरपालिकेच्या निवडणुकीत कुठलाही प्रकारे गैरप्रकार होऊ नये, या अनुषंगाने तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांच्‍या अधिपत्याखाली शहरात बाहेरून प्रवेश करणाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्‍याचप्रमाणे सीमेवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.‍ अवैध दारू, पैसे, शस्त्रसाठा येण्याची दाट शक्यता असल्‍याने वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. निवडणुकीत बाहेरून लोक बोलावून गोंधळ घातला जातो, तसेच वाईट कृत्य होण्याची शक्यता असते. त्यावर नियंत्रणासाठी आणि मतदान सुरळीत पार पडण्यासाठी तालुक्‍यात स्थिर सर्वेक्षण पथक सज्ज केले. प्रतिनिधी | मंगळवेढा मंगळवेढा पोलिसांच्या पथकाला मरवडे ते डोणज जाणाऱ्या रोडवर चौधरी वस्तीजवळ नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पेट्रोलिंग करत असताना स्कॉर्पिओमध्ये (क्रं. एमएच ४५ ए ९५०१) बेकायदेशीर विनापरवाना लोखंडी धारदार तलवार जवळ बाळगल्याप्रकरणी गणेश मारूती कचरे, रामभाऊ शहाजी पाटोळे (दोघे रा. मेंढापूर, ता. पंढरपूर), शिवदास उत्तम सोनवणे (रा. कळंबीर ता. साखरी, जि.धुळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन आरोपींना अटक करून मंगळवेढा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. फिर्याद पोना ईश्वर सिद्धलिंग दुधाळ यांनी दिली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.१४) मध्यरात्रीनंतर एक वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलिस उपनिरीक्षक विजय पिसे, पोहेकॉ श्रीमंत पवार, चापोहेकॉ चौधरी हे मंगळवेढा पोलिसांचे पथक सरकारी वाहनाने मंगळवेढा पोलिस ठाणे हद्दीत फरार आरोपी, पारधी वस्तीच्या तपासणीसाठी गेले होते. मरवडे ते डोणजकडे जाताना चौधरी वस्तीजवळ मरवडे (ता. मंगळवेढा) येथे मध्यरात्रीनंतर रात्री एक वाजेनंतर पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ (क्रं. एमएच ४५ ए ९५०१) दिसली. पथकाने थांबण्यास सांगितले व वाहनातील व्यक्तींची चौकशी केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्याने पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी तपासणी केली असता त्यात एक लोखंडी तलवार आढळली. वाहनातील व्यक्तींनी गणेश मारुती कचरे, रामभाऊ शहाजी पाटोळे (दोघे रा. मेंढापूर, ता. पंढरपूर), शिवदास उत्तम सोनवणे (रा. कळंबीर, ता. साखरी, जि. धुळे) अशी नावे सांगितली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील तलवार व गुन्ह्यातील वाहन २ पंचांसमक्ष पोहे. श्रीमंत पवार यांनी जप्त करत गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेतली. तीन व्यक्तींना अटक करत न्यायालयात हजर केले दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. घटनेचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल योगेश नवले करत आहेत. तलवार, स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी केली जप्त लोखंडी पाट्यापासून तयार केलेली तलवार आहे. तलवारीची लांबी २८ इंच असून मुठ ४.५ इंचाची आहे. रुंदी १.५ इंच आहे. पात्याची लांबी २३.५ आहे. तलवार समोरील बाजुला निमुळती व धारधार आहे. ही तलवार पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ (किंमत अंदाजे दोन लाख ५० हजार) जप्त करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:04 am

वैराग- धाराशिव एसटी बस वेळेवर सोडण्याची ग्रामस्थांकडून मागणी:एसटी बसबाबत शालेय विद्यार्थ्यांच्या तक्रारी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर‎

आपल्या विविध राष्ट्रीय सणाला गावागावात जनजागरण फेरी काढून आपण मुली वाचवा, मुलींना शिकवा अशा घोषणा देतो. अशा विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमामुळे शालेय मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात शहराकडे शिकण्यासाठी वाढले आहे. बहुतांश मुलींच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची नसल्याने ते पालक मुलींना दररोज शाळेत ने- आण करू शकत नाहीत किंवा खाजगी वाहनाने सोडवण्याची सोयही करू शकत नाही. त्यामुळे आपला प्रवास एसटी बस करावे लागते. बार्शी आगाराच्या बस एकतर नादुरुस्त असतात त्याच बस प्रवासात सोडल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना नागरिकांना याचा वारंवार हा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र अधिकाऱ्यांना अजूनही घाम फुटत नाही. बार्शी आगार प्रमुखांना वारंवार या तक्रारी संदर्भात फोन केला असता, फोनला देखील प्रतिसाद देत नाहीत. मी यासंदर्भात अधिकाऱ्यांनी जर वार्ताहरांशी बोलू शकत नाहीत, तर ग्रामस्थांच्या तक्रारीचे निरासन कसं होणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. शनिवारी रोजी चार वाजता विद्यामंदिर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर वैराग बसस्थानकात साडेतीन तास ताटकळत बसल्या होत्या. त्यांना विचारले असता, त्या म्हणाल्या तीन तासापासून अधिकवेळ झाला पण आम्हाला यावली गावाकडे जाण्यासाठी एसटी बस अजून आली नाही. त्यामुळे आम्ही घराकडे जायचं कसं, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:03 am

आठवणीतील निवडणूक‎:1986 मध्ये 250 रुपयांत लढली होती निवडणूक, संस्थेत प्राध्यापक, पण आकसाने कारवाई नाही

सन १९८५-८६ मध्ये कम्युनिस्ट पक्षाकडून तत्कालीन आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढताना त्यावेळी मला केवळ २५० रुपयांचा खर्च आला होता, अशी आठवण ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते प्रा. तानाजी ठोंबरे यांनी सांगितली. प्रा. ठोंबरे म्हणाले की, उपळाई व अलिपूर रस्त्याच्या मधील भाग व्हनकळस प्लॉट हा भाग माझ्या निवडणूकीचा वॉर्ड होता. मी कम्युनिस्ट पक्षाकडून उभा होतो. पाणी, वीज, आरोग्य, स्वच्छतेच्या प्रश्नावर आम्ही लढे लढले होते. दररोज सकाळ-संध्याकाळ प्रचारफेरी व्हायची. दमल्यानंतर कधीतरी फक्त चहा व्हायचा, असा तो काळ होता. त्याकाळी मतदारांना कोणतीही आमिषे दाखवली जात नव्हती. माझ्या विरोधात प्रभाताईंच्या पॅनलचे वाघे तर अपक्ष म्हणून बागवान उभे होते. प्रभाताई ज्या संस्थेच्या चेअरमन होत्या व आनंदराव पाटील अध्यक्ष होते, त्या संस्थेत मी प्राध्यापक होतो. तरीही त्यांच्याविरोधात काम करत होतो, त्यांच्या विरोधात जाहीर सभाही घेतल्या. मी ज्या वॉर्डातून लढत होतो. त्या वॉर्डाची जबाबदारी श्रीपतपिंपरीचे आनंदराव आप्पा यांच्यावर होती. लक्ष्मण ढोबळे माझे विद्यार्थी होते. त्यांच्या पहिल्या निवडणुकीत मी रजा काढून त्यांचा प्रचार केला होता. तरीही ढोबळेंनी आमच्याविरोधात बार्शीत सभा घेतली होती. त्यावेळचे दिग्गज नेते आनंदराव पाटील यांच्यावर माझ्या वॉर्डाची जबाबदारी होती. सर्वांनी जोर लावला तरी मी निवडून आलो. बहुमत नसल्याने सभागृहात मी विरोधी पक्षाचा सभागृह नेता होतो. प्रभाताई नगराध्यक्ष असताना सभागृहात प्रश्नांची सरबत्ती करायचो. परंतु त्या माझ्याशी कधीही आकसपूर्ण वागल्या नाहीत. माझे जेवढे धाडस तेवढेच त्यांच्या मनाचे मोठेपण होते. लोकशाहीच्या प्रक्रियेत त्यांनी अडथळा आणला नाही. उलट आमच्या सूचनांचा त्यांनी स्विकारच केला, असे त्यावेळचे राजकारण होते. त्यावेळी लोक विचारांच्या आधारावर निष्ठेने कामे करायची. तानाजी ठोंबरे एकेकाळी कसबा विरुद्ध पेठ असाही रंगायचा सामना तानाजी ठोंबरे म्हणाले की, अलिकडचा काळ वगळता या शहराच्या निवडणुका कधीच जातीपातीच्या नावावर लढल्या गेल्या नाहीत. उलट दीर्घकाळ अल्पसंख्याक समाजाचे नगराध्यक्ष या नगरपालिकेला लाभले. केवळ जाती-धर्म व पैशांच्या जोरावर निवडणूक लढवायचा तो काळ नव्हता. एकेकाळी येथे जातीवर नव्हे तर कसबा विरुद्ध पेठ असाही नगरपालिका निवडणुकीचा एक कालखंड होता. पेठ म्हणजे व्यापारी केंद्र असलेली माणसं. थोडीशी सधन आणि त्यांच्याविरोधात शेतकरी, कामगार, सर्वसामान्यांचा एक गट होता. त्याकाळी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून नागरिक मतदान करायचे. पुढच्या काळात शपथ घ्यायची सुरूवात झाली. लोक व नेते दिलेला शब्द पाळायचे. दुर्देवाने हे चित्र अलिकडे बदलले आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:02 am

खड्डे बुजवण्यामुळे इमामपूर घाटात 4 तास कोंडी‎:वाहतुकीचे नियोजन आणि पोलिस नसल्याने वाहनचालकांनी व्यक्त केला संताप

छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाटात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असलेल्या खड्डे बुजवण्याच्या कामामुळे शनिवारी दुपारी १२ वाजेपासून साडेचार वाजेपर्यंत सुमारे ३ किमी अंतरावर वाहतूक कोंडी झाली. कामाच्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आली होती; तरीही वाहतुकीचे नियोजन न केल्यामुळे व अवजड वाहने समोरासमोर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. घाटाच्या उतारापासून वरच्या दिशेने एक बाजू कामासाठी बंद असताना, दुसऱ्या दोन पट्ट्यांमधून वाहनांची येजा सुरू होती. मात्र, छत्रपती संभाजीनगरकडून अहिल्यानगरच्या दिशेने येणाऱ्या दोन बसेसने ओव्हरटेक करत उतारावर असलेल्या कंटेनरला अडथळा निर्माण केल्यामुळे कंटेनर व उताराच्या दिशेने येणारी सर्व वाहने थांबली. यामुळे कोंडी वाढली आणि काही काळ दोन रुग्णवाहिकाही अडकून पडल्या. वाहनचालकांनी थोडे पुढे उतरून रुग्णवाहिकांना मार्ग दिला, पण बेशिस्त वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे कोंडी सुटण्यास चार तासांचा वेळ लागला. काही लोकांनी पर्यायी मार्गांचा वापर केला. यामुळे घाटातील वाहतूक संथ गतीने चालू होती. वाहतुकीचे नियोजन आणि पोलिसांची उपस्थिती नसल्याने नागरिकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागले. प्रशासनाने भविष्यात अशा प्रसंगांवर योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचे वाहनचालकांनी म्हटले आहे. शिस्तबद्ध नियोजन करण्याची गरज शनिशिंगणापूरला जाणाऱ्या भाविकांची वाहने तसेच या मार्गावरील नेहमीची रहदारी यामुळे इमामपूर घाटात नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यातच खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतल्यामुळे शनिवारी वाहतूक ठप्प झाली. विशेष म्हणजे वाहतूक नियमन करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ तेथे नव्हते. त्यामुळे वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली. कामे न थांबवता शिस्तबद्ध नियोजन केल्यास वाहतूक खोळंबा टळू शकतो, असे वाहन चालकांनी व्यक्त केले.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:55 am

न्यू आर्टस् महाविद्यालयाला कबड्डीत पुणे विभागातून मिळाले विजेतेपद:तीन बलाढ्य संघांचा पराभव, वाशिम येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड

न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी पुणे विभागीय कबड्डी स्पर्धेत १९ वर्ष वयोगटात मुलांच्या संघाने पुणे शहर, नगर ग्रामीण, पुणे ग्रामीण या संघांचा पराभव करत प्रथम क्रमांक मिळवला. या विजयी सर्व संघाची वाशिम येथे १८ ते २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या संघामध्ये कर्णधार यश साळवे, सागर एडके, सार्थक शिंदे, शिवम गोरडे, साद कागदी, सुमित देसाई, महेंद्र परदेशी, कृष्णा काळे, गणेश ब्राह्मणे, शिवप्रताप शिंदे, यश कर्डिले, रोहित गायकवाड या खेळाडूंचा समावेश आहे. या यशाबद्दल सर्व संघाचे संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, अँड विश्वासराव आठरे, मुकेश मुळे, दीपलक्ष्मी म्हसे आदींसह सर्व विश्वस्त, सर्व कार्यकारणी सदस्य, संचालक डॉ. भास्क झावरे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे आदींनी अभिनंदन केले. न्यू आर्टस् कॉलेज हे खेळाडूंसाठी नेहमीच आवश्यक सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देत आले आहे. त्यामुळे अनेक नामवंत खेळाडू या कॉलेजमध्ये घडले त्यामध्ये पंकज शिरसाठ, क्रीडा आयुक्त शीतल उगले, पहिली महिला कुस्तीपटू अंजली देवकर, श्वेता गवळी, कोमल वाकळे, पूजा वऱ्हाडे असे अनेक नामवंत खेळाडू या महाविद्यालयात घडले आहेत. पुढील येणाऱ्या काळात देखील संस्था व न्यू आर्टस् कॉलेज सर्व खेळाडूंना आवश्यक सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देत राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्या आला. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा. सुधाकर सुंबे, प्रा. आकाश नढे यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, या विजयी सर्व संघाची वाशिम येथे १८ ते २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या संघामध्ये कर्णधार यश साळवे, सागर एडके, सार्थक शिंदे, शिवम गोरडे, साद कागदी, सुमित देसाई, महेंद्र परदेशी, कृष्णा काळे, गणेश ब्राह्मणे, शिवप्रताप शिंदे, यश कर्डिले, रोहित गायकवाड या खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेत न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या संघाने चांगली कामगिरी केली. या खेळाडूंच्या कामगिरीचे संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आता या संघातील खेळाडूंची वाशिम येथे याच महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धा येत्या १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान वाशिम येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचा संघ रवाना होणार आहे. संघातील या खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांना पुढील स्पर्धेसाठी महाविद्यालय आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. तीन कबड्डी संघांचा दणदणीत पराभव न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या कबड्डी संघाने स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली. या संघाने स्पर्धेत पुणे शहर, नगर ग्रामीण, पुणे ग्रामीण या तिन्ही संघांचा दणदणीत पराभव केला. आता या विजयी संघातील सर्व खेळाडूंची वाशिम येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:54 am

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जाणीव गरजेची:छावणी परिषदेत बालदिनानिमित्त बालअधिकार कार्यशाळा, विद्यार्थ्यांची हजेरी‎

नागरिकांना आपल्या अधिकारांसोबतच त्यांच्या कर्तव्यांची जाणीव होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कायद्याच्या साक्षरतेअभावी अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना बळी पडतो. म्हणूनच चांगल्या-वाईटाचे भान विद्यार्थीदशेपासूनच निर्माण व्हायला हवे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. डी. चव्हाण यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व छावणी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनानिमित्त बालअधिकार कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत न्या. चव्हाण बोलत होते. यावेळी कँटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी, योगेश पैठणकर, सीएसआरडीचे प्रा. सॅम्युएल वाघमारे, संजय शिंदे, राजू भोसले आदी उपस्थित होते. कुटुंबातील अस्थिर वातावरण, मोबाइलचा गैरवापर, योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे बालगुन्हेगारीत वाढ होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होणे आजच्या काळाची गरज आहे, असेही न्या. चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. मोबाइलच्य़ा वापराने बालगुन्हेगारी कशी वाढत आहे याची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पल्लवी विजयवंशी यांनी सांगितले, की भारताचे भविष्य विद्यार्थी आहेत. त्यांच्यात सातत्याने परिश्रम करण्याची जाणीव निर्माण झाली तर त्यांचा आत्मविश्वास वाढून ते नक्कीच उज्ज्वल भविष्य घडवू शकतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत योगेश पैठणकर व संगीता सुसर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, बालदिनानिंमित्त विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांत शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कलागुणांचे सादरीकरण केले. यानिमित्त शाळेत मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना बाल अधिकार कार्यशाळेच्या माध्यमातून आवश्यक माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सिमा चोभे यांनी तर आभार प्रदर्शन सोन्याबापू लबडे यांनी केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोबाइलमुळे बालगुन्हेगारीत वाढ कुटुंबातील अस्थिर वातावरण, मोबाइलचा गैरवापर, योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे बालगुन्हेगारीत वाढ होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होणे आजच्या काळाची गरज आहे, असेही न्या. चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:53 am

अत्याधुनिक वाचनालय, अभ्यासिकेतून उंचावणार विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा दर्जा:प्रत्येक वाचनालयासाठी 30 लाखांचा निधी, डॉ. थोरात यांच्या हस्ते भूमिपूजन‎

संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा दर्जा उंचावण्याच्या उद्देशाने चंदनापुरी, धांदरफळ बुद्रुक आणि निमगाव बुद्रुक येथे अत्याधुनिक वाचनालय व अभ्यासिकांच्या उभारणीचे भूमिपूजन पार पडले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून प्रत्येक वाचनालयासाठी ३० लाख रुपये निधी मंजूर झाल्याने ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा बळकट होणार आहेत. एकूण १२ आधुनिक अभ्यासिकांचे काम सुरू आहे. हे संपूर्ण प्रकल्प तालुक्याच्या विकासयोजनेतील एक उत्तम आदर्श ठरणार आहेत. युवक नेत्या डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या वेळी रामहरी कातोरे, अनिल देशमुख, विजय राहणे, शांताराम कढणे तसेच ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. थोरात म्हणाल्या, संगमनेर तालुका विस्ताराने मोठा आहे. शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासाच्या विविध योजनांमुळे येथे प्रगतीची ठोस पायाभरणी झाली आहे. रामहरी कातोरे म्हणाले, निळवंडे धरण, कालवे, पाइपलाइन, पायाभूत सुविधा अशा प्रकल्पांमुळे संगमनेर तालुका प्रगत दिशेने वाटचाल करत आहे. शिक्षण क्षेत्रातील ही नवीन पायरी तरुणांसाठी खूप महत्त्वाची ठरेल. हर्षल राहणे यांनी काही समाजघटकांकडून युवकांना चुकीच्या मार्गावर नेण्याचे प्रयत्न होतात, अशी खंत व्यक्त केली. “ग्रामीण भागात अभ्यासाची संस्कृती मजबूत करण्यासाठी थोरात परिवाराचे योगदान उल्लेखनीय आहे, असे त्यांनी सांगितले. संगमनेर तालुक्यात वाचनालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करताना डॉ जयश्री थोरात. ...तर अनेक सामाजिक प्रश्न आपोआप सुटतात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र, शांत आणि आधुनिक अभ्यासिकांची आवश्यकता लक्षात घेऊन हा उपक्रम राबवला जात आहे. मंजूर झालेला निधी पुढील पिढीला अधिक सक्षम बनवेल. युवकांमध्ये वाढणाऱ्या अमली पदार्थांच्या प्रवृत्तीबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत पालकांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले. तरुणांच्या हातात पुस्तकं आणि अभ्यासासाठी योग्य वातावरण असेल तर अनेक सामाजिक प्रश्न आपोआप सुटतात,असे डॉ. जयश्री थोरात यावेळी म्हणाल्या.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:52 am

लक्झरी-बस कारचा अपघात:आगीत कार चालकाचा मृत्यू

लक्झरी बस व एका कारचा अपघात झाल्याने कारला लागलेल्या आगीत कार चालकाचा जळून मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी, १४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर भास्कर वस्ती येथे घडली. यावेळी दोन्ही बाजूला महामार्गांर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. येवल्याच्या दिशेने जाणारी लक्झरी बस (एएस ०१, क्यूसी ३५१६) ही भास्कर वस्ती येथे आली असता येवल्याकडून कोपरगावकडे जाणारी कार या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी इतकी भीषण होती की कार ला आग लागली. त्या आगीत कार चालकासह कार पूर्ण जळून खाक झाली आहे. कार चालक विंचूर येथील असल्याची माहिती मिळाली. यावेळी स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. कोपरगाव नगरपालिका अग्निशमन दल, येवला नगर पालिका अग्निशमन दलाचे बंब यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनी बस मधील प्रवाशांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:52 am

पूरजन्य परिस्थितीमुळे यंदा रब्बी हंगामास विलंब:मुबलक पाणी असल्याने ऊस,कांदा, मका पिकाला प्राधान्य द्या, वरिष्ठ शास्त्रज्ञ कौशिक यांचा सल्ला‎

यंदा संपूर्ण देशासह व राज्यात खूप पाऊस झाला आहे. यामुळे राज्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. यामुळे रब्बी हंगाम पीक लागवडीसाठी विलंब होत आहे. आपल्या जिल्ह्यात भागात रब्बी हंगामात मुख्यत्वे करून गहू, मका, हरभरा, ऊस, कांदा या पिकांचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. सद्य परिस्थितीत पाण्याची मुबलक उपलब्धता असल्यामुळे शेतकरी ऊस आणि कांदा या पिकाला प्राधान्य देवून गहू, हरभरा व मका या पिकांचे देखील लागवड करू शकतात, असा सल्ला दहिगाव-ने कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ प्रमुख शास्त्रज्ञ एस. एस. कौशिक यांनी दिला आहे. शास्त्रज्ञ कौशिक म्हणाले, उसाच्या उत्कृष्ट उत्पादन देणाऱ्या जातींची जसे फुले १५०१२, फुले १३००७, फुले १५००६, को-८६०३२ तसेच कोएम-०२६५ यांची एक डोळा पद्धती किंवा रोपांच्या माध्यमातून लागवड करावी. हिवाळ्यात उगवण क्षमता वाढीसाठी ऊस बेणे लागवड करण्यापूर्वी त्याला कळीच्या चुन्याची २.५ कि.ग्रॅ. प्रती १०० लिटर पाण्यात भिजवून प्रक्रिया करावी. ऊस लागवडीसाठी भारी जमिनीत ६ x २ फुट व मध्यम जमिनीत ५ x २ फुट अंतरावर लागवड करावी. लागवडीसाठी ८ ते १० महिने वयाचे निरोगी बेणे वापरावे. कांदा पिकाची रोपवाटिका योग्य बियाणे वापरुन तयार करावी. कांदा पिकाच्या सुधारित जाती - अॅग्री फाउंड लाईट रेड (एएलआर), एनएचआरडीएफ- रेड २, एनएचआरडीएफ- रेड ३, एनएचआरडीएफ- रेड ४, एनएचआरडीएफ- रेड फुरसुंगी, भिमा-किरण, भिमा-शक्ती व भिमा-लाइटरेड किंवा खासगी कंपन्यांच्या जातीचे बियाणे ज्यावर शेतकरी बांधवांचा विश्वास आहे. या जातींच्या बियाण्याची बीजप्रक्रिया करून एकरी २.५ ते ३.० कि.ग्रॅ. कांदा बियाणे वापरुन ३.५ ते ४.० गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. गहू पिकाची पेरणी करण्यासाठी नोव्हेंबर महिना योग्य आहे. पेरणीपूर्वी गहू बियाणाची रासायनिक बीजप्रक्रिया करण्यासाठी बुरशीनाशक कॅप्टन / थायरम ३ ग्रॅम प्रती कि. ग्रॅ. बियाणे तसेच किटकनाशक थायमिथोक्झाम ३० % एफ.एस. ०.७५ मिली प्रती कि.ग्रॅ. बियाणे याप्रमाणे वापरावे. त्यानंतर अ‍ॅझॅटोबॅक्टर व पी.एस.बी. कल्चर २५ ग्रॅम प्रती कि.ग्रॅ. बियाणे याप्रमाणे जैविक बीजप्रक्रिया करूनच बियाणाची पेरणी करावी. गव्हाच्या सुधारित जाती - फुले-समाधान, एमएसीएस-६२२२, फुले-अनुपमा, पीडीकेव्ही-सरदार या एकरी ४० किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. रब्बी हंगामातील हरभरा हे मुख्य कडधान्याचे पीक आहे. हरभरा पिकाची पेरणी नोव्हेंबर महिन्यातच करण्याचे नियोजन करावे. हरभरा पेरणीसाठी एकरी २५ ते ३० कि.ग्रॅ. बियाणे वापरावे. हरभरा पिकाची पेरणी गादी वाफ्यावर करावी. हरभरा पिकावर येणाऱ्या घाटेअळी नियंत्रणाच्या दृष्टीने पक्षीथांबे तयार करण्यासाठी १०० ग्रॅम ज्वारी बियाणे प्रती एकर क्षेत्रावर फेकून द्यावे. जेणेकरून या ज्वारीच्या ताटांवर पक्षी बसण्याची व्यवस्था होईल, असे शास्त्रज्ञ कौशिक म्हणाले. मका पिकातून चांगला नफा मिळवू शकतात मका पिकाची लागवड व मागणी इथेनोलचा पेट्रोलमधील वापर तसेच मुरघास उत्पादन यामुळे दिवसेंदिवस वाढत आहे. रब्बी हंगामात मका पिकाची लागवड करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. मका पिकावर येणाऱ्या लष्करी अळींचे नियंत्रण करण्यासाठी सायंट्रायनीलीप्रोल १९.८ % + थायमिथोक्झाम १९.८ % एफएस ६ मिली प्रती कि.ग्रॅ. याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. रब्बी हंगामासाठी मका पिकाच्या योग्य वाणाची एकरी ६ ते ८ कि.ग्रॅ. बियाणे याप्रमाणे ७५ सेमी x २० - २५ सेमी अंतरावर टोकण करावे, असे शास्त्रज्ञ कौशिक म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:51 am

विनापरवाना बियाणे विक्रीप्रकरणी कंपनीवर गुन्हा:कनाशी येथे कृषी खात्याने केलेल्या कारवाईत दोन लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त‎

अवैधरित्या खते, बी-बियाणे वाहतूक व विक्री करतांना आढळून आल्याने कृषी खात्यातर्फे कारवाई करण्यात आली. त्यात वाहनासह दोन लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघा संशयितांसह कंपनीच्या संचालक मंडळावर अभोणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅग्रोझोन या कंपनीकडे खते, बी-बियाणे विक्री, साठवणूक व वाहतूक करण्याचा कोणताही परवाना नसतांना कळवण तालुक्यातील कनाशी येथे टेम्पोतून (एमएच १५, एचएच ५६७२) खते व बी-बियाण्यांची विक्री होत असल्याचे आढळून आले. स्थानिक कृषी व्यावसायिकांनी ही माहिती कळविल्याने तालुका कृषी अधिकारी विठ्ठल रंधे यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत पोलिस व व्यावसायिकांच्या उपस्थितीत एकूण मालाची पाहणी व तपासणी केली. त्यात शासनाचा परवाना नसलेला माल आढळून आला. शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी दीपक जाधव (रा. कसबे सुकेणे, ता. निफाड), संदीप भामरे, स्टेट हेड (रा. नाशिक) व कंपनीचे संचालक मंडळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:35 am

इगतपुरीतील निवडणूक पाणी व रस्ते या मुद्द्यांवरच गाजणार:36 कोटींची पाणीपुरवठा योजना सुरळीत राबविण्यात अपयश आल्याने पाण्यासाठी हाल‎

प्रतिनिधी | इगतपुरी नगरपरिषद निवडणूक संपूर्णपणे विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित होणार आहे. काही वर्षांपासून शहरातील पाणी पुरवठा, मुख्य रस्त्यांची डागडुजी, मलनिस्सारण व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, गार्डन आणि इतर अत्यावश्यक सुविधांचा अभाव नागरिकांना तीव्रतेने जाणवत आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय आरोप–प्रत्यारोपांपेक्षा दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांवरच उमेदवारांना फोकस करावा लागणार आहे. पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी शहर परिसरात जवळपास चार हजार मिलिमीटर पाऊस एवढा प्रचंड पाऊस पडूनदेखील पाणीपुरवठा ही दीर्घकालीन समस्या आहे. आठवड्यातून तीन वेळेस पाणी पुरवठा होतो. त्यात कोणतेही वेळापत्रक नसल्याने दिवसभर महिलांसह नागरिकांना पाण्याची वाट बघावी लागते. ३६ कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना सुरळीत राबविण्यात अपयश आल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या प्रश्नांमुळे मतदार अत्यंत जागरूक झाले आहेत. जनहिताच्या मुद्द्यांवर कोण प्रभावी धोरण मांडतो, कोण योजनांची वास्तवता स्पष्ट करतो आणि कोण प्रभागनिहाय अंमलबजावणीची हमी देतो यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहील. इगतपुरी शहरातील ही निवडणूक विकासाभोवतीच फिरणारी ठरणार असून पाणीप्रश्न, रस्ते आणि मूलभूत सुविधा हेच यातले खरे निर्णायक मुद्दे असतील, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. रस्त्यांची दुरवस्था शहरातील रस्त्यांची परिस्थिती अनेक वर्षांपासून नाजूक अवस्थेत आहे. खड्डेमय रस्ते, पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धूळ अशी परिस्थिती सर्वत्र दिसून येते. तळेगाव रोड, मुख्य बाजारपेठ, खालची पेठ, गावठा परिसर , गिरनारे येथील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याची भावना व्यापारी व स्थानिक नागरिक सातत्याने व्यक्त करत आहेत. इतर शहरांपेक्षा इगतपुरी शहर विकासाच्या बाबतीत खूप मागे दिसत आहे. स्थानिक युवकांना रोजगार नसल्याने होणारे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक बाजारपेठेचा विकास, सुयोग्य घनकचरा व्यवस्थापन, कचरामुक्त स्वच्छ शहर, रोज नळाला पाणी मिळावे यासाठी योग्य व्यवस्थापन हवे. - प्रदीप बागल, डॉक्टर गावाचा विकास करण्यासाठी रस्ते, वीज, पाणी, आरोग्य उच्चशिक्षण या मुलभूत गोष्टी गरजेच्या आहे.त्यापासून इगतपुरीतील राजकीय इच्छाशक्ती कमी पडलेली आहे. आपले गाव नॅशनल हायवे-रेल्वे स्टेशन -पाऊस हे असताना अजून बाकी गावांपेक्षा खूप मागे आहे. - नीलेश करवा, व्यापारी

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:32 am

बिबट्याची दहशत !:शाळा बंद, ठार करण्यासाठी दिला प्रस्ताव

अहिल्यानगर जिल्ह्यात दोन आठवड्यात बिबट्याकडून झालेल्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनांमुळे जिल्हाभरात बिबट्याची दहशत पसरली आहे. शेती करणे अवघड झाले आहे. आता विद्यार्थ्यांनाही पालक शाळेत पाठवत नाहीत. त्यामुळे अहिल्यानगर तालुक्यात इसळक, निंबळक, कर्जुने-खारे या भागातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या भागातील नरभक्षक बिबट्याला ठार करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी निंबळक येथे अहिल्यानगर बायपास मार्गावर शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. वनविभागाने लेखी आदेश घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. कोपरगाव तालुक्यातील टाकळी खातगाव, यसगाव या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात दोन मृत्यू झाले. त्यानंतर कर्जुने खारे येथे एका चिमुरडीचा हल्ल्यात मृत्यू झाला. या घटना दिवसेंदिवस वाढत असून, शुक्रवारी सायंकाळी इसळक शिवारात नऊ वर्षीय मुलावर हल्ला केला. रात्रीचा वीजपुरवठा असलेल्या ठिकाणी पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. तर घटना घडलेल्या पंचक्रोशीत शाळा तीन दिवसांपासून बंद आहेत. संतप्त नागरिकांकडून बिबट्याला मारून टाका, अशी मागणी होत आहे. अहिल्यानगर शहर बायपास महामार्ग ग्रामस्थांनी अडवून धरत, जोरदार घोषणाबाजी केली. बिबट्याला ठार करण्याचे लेखी द्या, अशी मागणी लावून धरली. त्यावर उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी मुख्य वनरंसक्षक नाशिक यांना पत्र पाठवून, जेरबंद अथवा बेशुद्ध करून पकडणे अथवा ठार करणे, अथवा त्याला ठार करण्याची परवानगी मागितली. ही परवानगी सायंकाळी पाच पर्यंत येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले. परंतू, उशिरापर्यंत वनविभागाकडून खुलासा न आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेतीला पाणी कसे द्यायचे ? बिबट्याला ठार करण्याची परवानगी मिळावी यासाठी आम्ही बायपासवर सकाळी ११ वाजेपासून आंदोलन केले. या परिसरात सात ते आठ बिबटे असू शकतात. कर्जुने-खारे, इसळक, निंबळक, हिंगणगाव, हमीदपूर भागात दहशत आहे. रात्रीची वीज असून गव्हाला पाणी द्यावे लागते. पण बिबट्याचा उपद्रव वाढल्याने पाणी कसे द्यायचे असा प्रश्न आहे. तसेच शाळाही बंद ठेवल्या आहेत. -अंकूश शेळके, माजी उपसरपंच, कर्जुने-खारे. कर्जुने खारे व इसळक शिवारातील नरभक्षक बिबट्याला ठार करण्याच्या मागणीसाठी दोन तासांहून अधिकवेळ बाह्यवळण रस्ता अडवला. वनविभागाने त्या बिबट्याला ठार करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यावर बिबट्याला ठार करण्याचा प्रस्ताव नाशिक येथील मुख्य वनसंरक्षकांना पाठवल्याचे सांगण्यात आले. कैलास लांडे म्हणाले, आंदोलन सोडवण्यापुरतेच वनविभागाने आश्वासन दिले. नंतर फोनही उचलत नाहीत. रविवारी ग्रामस्थ चर्चा करून पुढील दिशा ठरवतील.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:22 am

शफेपूरमध्ये 19 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या:कुटुंबावर दुःखाचा डोंगर, वडिलांचे काही महिन्यांपूर्वी झाले निधन, मोठ्या भावानेही केली होती आत्महत्या‎

कन्नड तालुक्यातील पिशोर येथील शफेपूर येथे राहत्या घरात १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उशिरा रात्री उघडकीस आली. मनोज तुकाराम मोकासे (१९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलिस ठाण्याचे बीट जमादार वसंत पाटील, दत्तू लोखंडे व विजय भोटकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत्यूची खात्री केल्यानंतर डॉक्टर बनसोडे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. शनिवार सकाळी शफेपूर येथील स्थानिक स्मशानभूमीत मनोजच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत मनोजच्या कुटुंबावर गेल्या काही काळापासून दुःखांचे सावट होते. सुमारे वर्षभरापूर्वी मनोजचे वडील हरिभाऊ मोकासे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांपूर्वी मोठ्या भावानेही गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती. आता एकुलता एक आधारस्तंभ असलेल्या मनोजनेही आत्महत्या केल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पिशोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सपोनि शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार दत्तू लोखंडे व वसंत पाटील पुढील तपास करीत आहेत. दरम्यान आईला एकमेव असणाऱ्या मुलाचा आधारही गेल्या पिशोर परिसरातील ग्रामस्थांत, नातवाईकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:20 am

25 वर्षीय विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या:पाचोडमधील कल्याणनगर येथील घटना, पोलिसांत नाेंद‎

पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याणनगर भागात राहणाऱ्या आकाश सोमनाथ शेळके या २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. आकाशचे आई-वडील मागील महिन्यात ऊसतोडीसाठी बाहेरगावी गेले होते. पत्नी काही दिवसांपासून माहेरी होती. त्यामुळे तो मानसिक तणावात होता. शुक्रवारी रात्री उशिरा जेवण करून तो झोपला. शनिवारी सकाळी त्याचे घर उघडले गेले नाही. त्यामुळे त्याच्या मावसभावाने घर उघडून पाहिले. त्या वेळी आकाशने पंख्याला साडीने गळफास घेतल्याचे दिसले. त्याने आरडाओरड केली. नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ ११२ वर फोन करून माहिती दिली. बीट जमादार अण्णासाहेब गव्हाणे यांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिकांच्या मदतीने आकाशला खाली उतरवले. त्याला पाचोड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ. संदिपान काळे यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणाची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:19 am

खंडाळा परिसरात बिबट्याच्या दहशतीने 170 विद्यार्थ्यांची दांडी:पुन्हा दिसल्यावर पिंजरा लावू असे म्हणत वन विभागाची टोलवाटोलवी‎

खंडाळा खंडाळ्यात बिबट्याच्या दहशतीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली असून शेतकऱ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करणेदेखील टाळले जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. किरण सोनवणे यांच्या मक्याच्या शेतात १५ नोव्हेंबर रोजी दुपारी २:०० वाजेच्या दरम्यान बिबट्या दिसून आला होता. येथील दाट झाडीत कालपासून लपून बसला असताना यावर वन विभागाने उपाययोजना करणे अपेक्षित होते. परंतु वन विभागाचे कर्मचारी पहिल्या दिवशी पाहणी करून गेले. त्यानंतर सध्या काय परिस्थिती आहे याचा खुलासादेखील घेतला नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. एखाद्यावर जीवघेणा हल्ला केल्यानंतरच वन विभाग कारवाई करेल की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या खंडाळा परिसरात बहुतांश ठिकाणच्या शेतामध्ये मका काढणे, तसेच रब्बी पिकासाठी शेतीची मशागत व लागवड सुरू असताना बिबट्याच्या दहशतीमुळे शेतातील कामे करणे थांबले जात आहे. काल बिबट्या दिसल्यापासून घरातील सर्वच सदस्य भयभीत झाले आहेत. वस्तीपासून असलेल्या हाकेच्या अंतरावरील झुडपामध्ये कालपासून बिबट्या लपून बसला आहे. कारण या परिसरात डुकरांचा संचारदेखील मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून तो ही जागा सोडणार नाही. वन विभागाने त्याला हाकलून तरी द्यावे, नसता पकडून घेऊन जावे, अशी मागणी शेतकरी किरण सोनवणे यांनी दिली आहे. या झुडपात बिबट्या लपला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. ^एका जागेवर बिबट जास्त वेळ थांबत नाही. परिसरात बिबट्या आढळल्यास त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावू. बिबट जर ती जागा सोडत नसेल व वारंवार नागरिकांना त्या परिसरात दिसत असेल तर वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात येईल. शेतकऱ्यांनी शेतात जातना सावधानतेने जावे. -आस्मा सय्यद, वनरक्षक जंगल परिसरात संचार करणारे बिबटे मानवी वस्तीत येऊन धुमाकूळ घालत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेला वन विभाग यावर उपाययोजना करण्यास अपयशी ठरत आहे मात्र शेतकरी व ग्रामस्थांची बिबट्याच्या दहशतीने मात्र झोप उडाली आहे. मागील महिन्यात ८ ऑक्टोबर रोजी खंडाळ्यातील ७११ गट नंबर क्षेत्रामधील कचरू जेजुरकर यांच्या शेतातील गोठ्याजवळ बिबट्याने हरिणीची शिकार करून तुरीच्या शेतात ओढत घेऊन गेला असल्याचे बघावयास मिळाले. या वेळी वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांनी येऊन अर्धवट शिकार सोडलेल्या हरणाची विल्हेवाट लावली. त्यानंतर कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. { खंडाळा येथील जिल्हा परिषद प्रशालेत इयत्ता पाचवी ते दहावीची एकूण ४३५ विद्यार्थी संख्या असून बिबट्याच्या दहशतीने शनिवारी शेतवस्तीसह गावातील १७० पेक्षा अधिक विद्यार्थी शाळेत आलेच नाही. अशी माहिती जि. प. शाळेचे मुख्याध्यापक अल्लाउद्दीन शेख यांनी दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:18 am

माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा:शासन निर्णयानुसार झाली माजी विद्यार्थी संघाची स्थापना‎

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शुक्रवारी उत्साहात पार पडला. गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड, गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे आणि केंद्रप्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. शासन निर्णयानुसार माजी विद्यार्थी संघाची स्थापना यावेळी करण्यात आली. अनेकांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत उपयुक्त वस्तू भेट दिल्या. अॅड. राजेश गिरी यांनी संगणक दिला. अनिल मानकर, रवींद्र काळे आणि मापारी यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आर्थिक मदत दिली. कृषिभूषण अरुण सोहनी यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस जाहीर केले. तिरुपती पतसंस्थेने आर्थिक मदत दिली. व्यापारी प्रमोद रावणे यांनी दहा डस्टबिन दिले. गणेश आगे यांनी एक मोठा डस्टबिन दिला. भास्कर चौधरी यांनी शैक्षणिक साहित्य जाहीर केले. शासन निर्णयाची अंमलबजावणी शिक्षिका मंगला बोरसे, मुख्याध्यापक किरण पाटील आणि शिक्षक रामचंद्र महाकाळ यांनी केली. कार्यक्रमास गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड, केंद्रप्रमुख फिरोज तडवी, ॲड. राजेश गिरी, प्रा. अनिल मानकर, बाळूभाऊ बोरसे, नगरसेवक राजेंद्र दुतोडे, अण्णा वाघ, मंगेश सोहनी, योगेश पाटील, विजय कदम, बाबू शहा, दत्तू काटोले, दिलीप चौधरी, भास्कर कोरडे, विवेक महाजन, अंकुश पगारे, रामेश्वर शिरसाठ, पोलिस कॉन्स्टेबल सादिक तडवी यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशासाठी मुख्याध्यापक किरणकुमार पाटील, सुरेखा चौधरी, रामचंद्र महाकाळ, मंगला बोरसे, सविता पाटील, गणेश बाविस्कर, प्रतिभा कोळी, अंकुश काळे, विकार शेख, बी. वाय. बागवान आणि शुभम देसले यांनी मेहनत घेतली. माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी अध्यक्षपदी रवींद्र पंडित काळे, उपाध्यक्ष मंगेशभाऊ सोहनी, कार्याध्यक्ष अनिल मानकर, सहकार्याध्यक्ष बाबूशहा तुराबशहा यांची निवड झाली. सदस्य म्हणून अॅड. राजेश गिरी, अॅड. योगेश पाटील, कृषिभूषण अरुण सोहनी, बाळू बोरसे, दत्तू काटोले, रवी काटोले, अंकुश पगारे, विजय कदम, भास्कर कोरडे, दिलीप चौधरी आणि योगेश नागपुरे यांची निवड झाली.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:18 am

पालकांची सेवा हेच आपल्या संस्कारांचे प्रतिबिंब- परळीकर

पालकांची सेवा ही केवळ जबाबदारी नाही, ती आपल्या संस्कारांची खरी ओळख आहे. ज्यांच्या घरी आई-वडिलांना मान दिला जातो, ते घर नेहमी सुखी राहते, असे प्रतिपादन तुकाराम महाराज मुंढे शास्त्री परळीकर यांनी केले. तलवाडा येथे झालेल्या प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आमदार प्रा. रमेश बोरणारे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, संजय पाटील निकम, बाबासाहेब जगताप, साबेरभाई, रामहारी जाधव, ज्ञानेश्वर जगताप, भागीनाथ मगर, ज्ञानेश्वर महाराज मधाने, चन्ने महाराज, राहुल खरे, गणेश महाराज, माऊली महाराज, दत्तु पाटील, राजेंद्र मगर, मधुकर पवार, विशाल शेळके, बाळासाहेब भोसले यांची उपस्थिती होती. महाराज म्हणाले, आई-वडिलांविषयी आदर, कृतज्ञता आणि समर्पण ही भारतीय संस्कृतीची मुळे आहेत. पालकांची सेवा म्हणजे देवाची सेवा. आईच्या पोटातील कष्ट, वडिलांचा त्याग कोणत्याही मुलाने विसरू नये. वृद्धावस्थेत त्यांना आधार, प्रेम आणि सन्मान देणे हीच खरी पूजा आहे. आजच्या पिढीतील बदलते वातावरण, वेगवान जीवनशैली आणि दुरावलेली नाती यावरही त्यांनी भाष्य केले. संस्कारांची सुरुवात घरापासून होते. घरात पालकांना मान देणे, त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे, बोलण्यात गोडवा ठेवणे हीच खरी परंपरा आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात नागरिकांनी शास्त्री महाराजांचे विचार मनोपूर्वक ऐकले. समारोपप्रसंगी ‘पालक सेवेचा संकल्प’ घेण्यात आला. कुटुंबसंस्कृती मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले. सांगितली संतपरंपरेची शिकवण संतांनी समाजासाठी असंख्य ग्रंथ लिहिले. पण कधीही त्यावर मालकी सांगितली नाही. ज्ञान सर्वांसाठी खुले असावे, हीच संतपरंपरेची शिकवण आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांनी रचलेले अभंग, ओव्या, गाथा हे समाजाचे सार्वजनिक धन आहे. त्यांनी ‘हे माझे आहे’ असे कधीच म्हटले नाही. ‘हे जग सुधारण्यासाठी आहे’ असा संदेश दिला.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:17 am

भाजपच्या व्यासपीठावर‎ भानुदास कोतकरांची एंट्री:अहिल्यानगर‎ शहरात राजकीय चर्चांना उधाण, बोरुडे–लोंढे यांसह अनेकांचा प्रवेश

महापालिका निवडणूक जाहीर ‎‎होण्यापूर्वीच शनिवारी भाजपच्या ‎‎व्यासपीठावर भानुदास कोतकर‎यांनी एंट्री’ केल्याने चर्चेला उधाण ‎‎आले. दरम्यान, पालकमंत्री‎राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत ‎‎माजी उपमहापौर अनिल बोरुडे,‎माजी सभापती सुभाष लोंढे यांनी ‎‎भाजपमध्ये प्रवेश केला.‎ महापालिका निवडणुकीच्या ‎‎अनुषंगाने भाजपने शिवसेनेतील ‎‎(ठाकरे गट) माजी उपमहापौर‎अनिल बोरुडे, माजी सभापती पुष्पा ‎‎बोरुडे, स्थायी समितीचे माजी‎सभापती सुभाष लोंढे यांच्यासह ‎‎अनेकांनी पालकमंत्री विखे यांच्या ‎‎उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. ‎‎दरम्यान, आपण भाजपत प्रवेश‎करत नसून एका खासगी‎कामानिमित्त मंत्रिमहाेदयांची भेट‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎घेण्यासाठी आल्याचे काेतकर यांनी‎यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना‎ सांगितले.‎ शहरातील ‎घडामाेडींना वेग‎ आगामी महापालिका निवडणुकीत‎महायुती म्हणून भाजप, शिवसेना‎(शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित‎पवार) एकत्रित निवडणूक‎लढवणार आहेत. तत्पूर्वी‎नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी‎भाजपकडून पालकमंत्री राधाकृष्ण‎विखे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती‎करण्यात आली. तर राष्ट्रवादीकडून‎आमदार संग्राम जगताप यांची‎नियुक्ती केली आहे. या‎निवडणुकीनंतर लगेचच‎महापालिका निवडणूक होणार‎असल्यामुळे शहरातील घडामोडींना‎वेग आला आहे.‎

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:15 am

चिमुकल्या राशीचा मृत्यू पाण्यात बुडून; शवविच्छेदन अहवालातून निष्कर्ष समोर:पिसादेवीतील साडेपाच वर्षांच्या चिमुकलीचे मृत्यू प्रकरण; घातपाताच्या संशयाला तूर्तास पूर्णविराम

पिसादेवी येथील ओंकार सिटी बांधकाम साइटवरून बेपत्ता झालेल्या साडेपाच वर्षांच्या राशी सिनू चव्हाण हिचा मृतदेह चौथ्या दिवशी शेतातील विहिरीत तरंगताना आढळला. तब्बल चार दिवस चाललेल्या शोधमोहिमेनंतर शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) सायंकाळी तिचा मृतदेह सापडला. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती चिकलठाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी दिली. मुलीच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमेचे किंवा दुखापतीचे चिन्ह आढळले नाही. मध्य प्रदेशातील दांपत्य ओंकार सिटी बांधकाम साइटवर मजुरी करते. त्यांची मुलगी राशी ही ११ नोव्हेंबरला बेपत्ता झाली होती. त्यानंतर चिकलठाणा पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पथकांनी परिसरातील सर्व विहिरी, तलाव, झाडेझुडपे, ओसरी, शेतमळ्यात शोध घेतला. अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र कोणताही ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास बांधकाम साइटपासून ३०० मीटर अंतरावर एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत मृतदेह तरंगताना आढळला. अग्निशमन दलाने मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. पेरूसाठी गेली असावी, पोलिसांचा प्राथमिक संशय : राशीला पेरू खाण्याची आवड होती, ती नेहमी शेतातून पेरू तोडून फ्रॉकमध्ये भरून आणत असे, असे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे पेरू आणण्यासाठी शेताकडे गेली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. विहीर संशय वाढवणारी मृतदेह सापडलेली विहीर रस्त्यापासून ३० फूट आत, झाडाझुडपांच्या आड दडलेली असून तिच्याभोवती अंदाजे ३ फूट उंच कठडे आहेत. त्यामुळे एवढ्या उंच कठड्यावरून चिमुकली विहिरीत पडली कशी, असा प्रश्न उपस्थित झाला होता. याशिवाय विहिरीवर सुरक्षा जाळी नव्हती. मुलीच्या अंगातील फ्रॉक आणि शूज व्यवस्थित अवस्थेत आढळले.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:00 am

उद्या संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा:संत ज्ञानेश्वरांच्या जन्मभूमीमध्ये नवे तीर्थक्षेत्र, 53 कोटींचा प्रकल्प

संत ज्ञानेश्वर यांचे जन्मस्थान असलेल्या आपेगावला विशेष महत्त्व आहे. या क्षेत्राला आज तीर्थक्षेत्र म्हणून नवी ओळख मिळाली आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराच्या लगतच्या परिसराचा आता कायापालट केला जाणार आहे. ५३ कोटींच्या निधीतून येणाऱ्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गोदाकाठावर लेझर शो, कीर्तिस्तंभ, घाटाच्या विकासासह १०० केव्हीचे सोलार बसवण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे अकराव्या शतकात मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. येथे संत ज्ञानेश्वरांचे मंदिर संपूर्ण दगडी बांधकामात केलेले आहे. हे वास्तुशिल्प आणि नक्षीकाम मंदिराच्या कामातून बघायला मिळते. आता भक्तनिवास, हॉल, कीर्तिस्तंभ, २१ फुटी विठ्ठलमूर्ती आपेगावच्या संत ज्ञानेश्वरांच्या मंदिरापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावरचा संपूर्ण परिसर विकसित केला जात आहे. आर्किटेक्ट महेश साळुंके यांच्या कल्पनेतून आराखडा तयार केला आहे. मंदिरालगतच १६ खोल्यांचे भक्तनिवास, क्लिनिक, दुकाने तसेच १० हजार स्क्वेअर फुटांचे संतांना राहण्यासाठीचे निवास, एवढेच नाही तर १ हजार स्क्वेअर फुटांचे विविध कार्यक्रमांसाठीचे २ हॉल उभारण्यात येत आहेत. २ कमानी बांधणार, मंदिराचे वॉटरप्रूफिंग या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येण्यासाठी शहागड-आपेगाव आणि पाचोड-आपेगाव या दोन रस्त्यांवर परंपरेचा वारसा दर्शवणाऱ्या दोन भव्य कमानी उभारल्या जाणार आहेत. त्यावर आकर्षक नक्षीकामही केले जाईल. तसेच मंदिराच्या बाहेरून डेव्हलपमेंटचे काम आणि वॉटरप्रूफिंग केले जाणार आहे ४ हजार भाविकांसाठी घाट विकसित करणार मंदिरालगत गोदावरी नदीकाठावर ६० हजार स्क्वेअर फुटांचा घाट असून या ठिकाणी एकाच वेळी ४ हजार भाविक बसू शकतील, अशी सुविधा केली जात आहे. एवढेच नाही तर नदीवर हॅलोग्रामवर लेझर वॉलवर माउलींचा इतिहास आणि संतांचा वारसा दाखवण्याची सुविधा केली जाणार आहे. आपेगाव डॅम ते पैठण-आपेगाव रस्ता रुंदीकरण प्रस्तावित आहे. बांधकामात साडेतीन ओव्यांचे अधोरेखन नातरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा, कां अवयवचि नभा निवडला तो.. या ओवीचे महत्त्व बांधकामात बघायला मिळते. येथे ३ लाख ८० हजार स्क्वेअर फुटांचा विकास होत आहे. दररोज १० हजार भाविक येतील, यानुसार सुविधांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. - महेश साळुंके, वास्तुविशारद.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 6:54 am

चार वर्षांच्या चिमुकल्याला मारहाण; डेंटिस्टसह कंपाउंडरवर गुन्हा दाखल:सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रकार उघड झाल्याचा दांपत्याचा दावा

दाताच्या दुखण्यामुळे उपचारावेळी रडत असलेल्या चार वर्षांच्या मुलाला डॉक्टर व कंपाउंडरने मारहाण केल्याचा आराेप प्रतापनगरातील एका दांपत्याने केला आहे. पाेलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना २७ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान ज्योतीनगर भागातील साई दातांचा दवाखाना येथे घडली. डॉ. राहुल बिराजदार (रा. रिद्धीसिद्धी अपार्टमेंट, ज्योतीनगर) आणि कंपाउंडर किरण अशी आरोपींची नावे आहेत. प्रतापनगर भागातील रहिवासी ३१ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, त्यांच्या ४ वर्षांच्या मुलाचा दात दुखत असल्याने २७ ऑक्टोबरला संंध्याकाळी साडेआठच्या सुमारास साई दातांचा दवाखाना येथे गेल्या. दात तपासून डाॅ. बिराजदार यांनी औषध गोळ्या लिहून दिल्या. त्याच दिवशी रात्री ११:३० वाजता डॉ. बिराजदार यांनी फाेन करून २८ रोजी मुलाला तपासणीसाठी घेऊन येण्यास सांगितले. २८ राेजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास महिला तिची सासू व मुलाला घेऊन दवाखान्यात गेली. त्यांचे पती थोड्या वेळात आले. डॉ. बिराजदारांनी मुलाची तपासणी करून चार दात किडलेले असल्याने तीन दातांत सिमेंट भरून एका दाताला छिद्र पाडले. घरी गेल्यानंतर मुलाला रात्री खूप ताप आल्याने तीन दिवस ते दवाखान्यात गेले नाही. १ नोव्हेंबरला डॉ. राहुल बिराजदार यांनी कॉल करून मुलाला रूट कॅनॉलसाठी घेऊन येण्यास सांगितले. दांपत्य मुलाला घेऊन बिराजदार यांच्या दवाखान्यात गेले. मात्र मुलगा रडत असल्याने डॉक्टरांनी दांपत्याला बाहेर जाण्यास सांगितले. थोड्या वेळानंतर दांपत्य मुलाकडे गेले तेव्हा तो ओक्साबोक्सी रडत होता. महिलेने त्याला जवळ घेतले तेव्हा त्याच्या गालावर मारल्याचे निशाण दिसले. रात्री डॉक्टरला फोन करून मारहाणीचा जाब विचारला असता त्यांनी मारहाण केली नसल्याचे सांगितले. सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रकार उघडकीस ३ नोव्हेंबरला रात्री दांपत्य सीसीटीव्ही फुटेज बघण्यासाठी साई दातांचा दवाखान्यात गेले. मात्र फुटेज ओपन होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना स्वतः डीव्हीआर घेऊन जा, तो दुरुस्त करून तपासा असे बोलले. त्यामुळे दांपत्य डीव्हीआर घेऊन गेले. त्यांनी तो दुरुस्त करून तपासणी केली तेव्हा १ नोव्हेंबरच्या फुटेजमध्ये डॉक्टर आणि कंपाउंडर मुलाला मारहाण करताना दिसून आले. याचा डॉक्टरला जाब विचारला तेव्हा ट्रीटमेंटचा भाग असल्याचे सांगून शिवीगाळ करून दांपत्यालाच धमकावले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तर ब्लॅकमेलिंग, मीसुद्धा तक्रार दिली मी २१ वर्षांपासून प्रॅक्टिस करतो. माझ्याविरुद्ध एकही तक्रार नाही. मुलाच्या कुटुंबीयांकडून मला ब्लॅकमेल केले जात आहे. या संदर्भात मी उस्मानपुरा पोलिस ठाणे तसेच पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. -डॉ. राहुल बिराजदार, दंतराेगतज्ज्ञ

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 6:51 am

शिस्त की हत्या:10 मिनिटे उशीर, 100 उठाबशांच्या शिक्षेने वसईत विद्यार्थिनीचा मृत्यू, काजलच्या मृत्यूनंतर पालकांत संताप!

शिस्तीच्या नावाखाली वसईच्या श्री हनुमंत विद्यामंदिर हायस्कूलच्या शिक्षिकेने क्रौर्याचा कळस गाठला. शाळेत येण्यास उशीर झाला म्हणून शिक्षिकेने १२ वर्षीय विद्यार्थिनीला पाठीवरील दप्तरासह १०० उठाबशा काढण्याची शिक्षा सुनावली. त्यामुळे ही शिक्षा भोगत असतानाच विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली व तिला रुग्णालयात हलवावे लागले. मात्र उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महाराष्ट्रातील शालेय शिक्षणावरील ‘कॉपोरल पनिशमेंट’चे ग्रहण संपले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बालदिन साजरा होत असतानाच १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ही हृदयद्रावक घटना घडल्याने पालकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली असून मनसेने प्रशासकीय यंत्रणेवर आक्रमक सवाल उपस्थित केला आहे. वसईच्या श्री हनुमंत विद्यामंदिर हायस्कूलची इयत्ता ६ वीची विद्यार्थिनी काजल गोंड (१२) ही ८ नोव्हेंबर रोजी शाळेत केवळ १० मिनिटे उशिरा पोहोचली होती. याच किरकोळ कारणास्तव एका शिक्षिकेने तिला चक्क पाठीवर दप्तर ठेवून १०० उठाबशा काढण्याची अमानुष शिक्षा दिली. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनुसार, ही शिक्षा पूर्ण होताच काजलच्या कंबर आणि पायांमध्ये तीव्र वेदना सुरू झाल्या. तिची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने नालासोपारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने तिला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, उपचारांदरम्यान १४ नोव्हेंबर रोजी, म्हणजे बालदिनीच काजलची प्राणज्योत मालवली. शाळा प्रशासनावर खुनाचा गुन्हा नोंदवा : पालक संबंधित शिक्षिका व शाळा व्यवस्थापनावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांसह मनसेने केली आहे. शिवाय विविध राजकीय संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने दोषींवर एफआयआर दाखल होईपर्यंत शाळा पुन्हा सुरू करू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 6:48 am

राज्यात बिबटे किती, वन खात्याला माहीतच नाही:नेमका आकडा नोंद नसल्याने त्यावर आळा घालणारी ठोस योजनाही नाही

बिबट्यांच्या हल्ल्यांत दगावणाऱ्यांची संख्या मोजली जातेय, मात्र राज्यात नेमके बिबटे किती ही संख्या ना वन खाते सांगू शकते ना राज्य शासन. संरक्षित वन क्षेत्रातील व्याघ्र गणनेत कॅमेराबद्ध होणाऱ्या बिबट्यांची वन खाते नोंद ठेवते, पण जंगलाबाहेर मानवी वस्त्या, शेत, शिवारात गणनेची कोणतीही वैज्ञानिक पद्धत सध्या तरी अस्तित्वात नाही. वन खात्याच्या अंदाजानुसार २०१४ मध्ये राज्यातील बिबट्यांची अंदाजे संख्या ७०० वरून २०२२ पर्यंत २ हजारांच्या घरात गेली आहे. राज्यात २०१९ पासून आतापर्यंत बिबट्यांच्या हल्ल्यात १२५ जण मृत्युमुखी पडले. बिबट्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांची संख्या सरकार सांगू शकते, मात्र राज्यात नेमके बिबटे किती याची संख्या मात्र सांगू शकत नाही. कारण, बिबटे मोजण्यांची कोणतीही शास्त्रशुद्ध पद्धत किंवा यंत्रणा सरकारकडे नाही. परिणामी व्याघ्र गणनेत संरक्षित वनक्षेत्रात निदर्शनास येणारी बिबट्यांची संख्या प्रत्यक्षातील बिबट्यांच्या संख्येच्या तुलनेत फारच तोकडी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. संख्या नियंत्रणासाठी हार्मोनल इंजेक्शन्स हवे पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये झालेली वाढ त्यांच्या मानवी वस्तीजवळील अनुकूल वातावरणामुळे आहे. ऊस शेती आणि भटक्या जनावरांच्या मुबलकतेमुळे जुन्नर-शिरूर संघर्ष स्थळे झाली आहेत, नैसर्गिक शिकारीचा ऱ्हास आणि अवैज्ञानिक स्थलांतरण समस्या वाढवते. उपाय म्हणून, त्वरित वैज्ञानिक सर्वेक्षण, एआय पाळत आणि भटक्या प्राण्यांचे व्यवस्थापन आवश्यक आहे. दीर्घकालीन समाधानासाठी, बिबट्यांच्या संख्या नियंत्रणासाठी हार्मोनल इंजेक्शन्स आणि शास्त्रीय पद्धतीने ठरवलेले स्थलांतरण धोरण उपायकारक ठरू शकते.’ - मंदार पिंगळे, उपसंचालक, सातपुडा फाउंडेशन

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 6:43 am

विरोधकांनी पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण करावे:‘जो जिंकला तोच सिकंदर...’, बिहार निकालावरून फडणवीसांचा टोला

बिहारच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधकांनी आत्मपरीक्षण न करता उलटसुलट आरोप सुरू केले आहेत. राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासह सर्व विरोधक पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. जोपर्यंत विरोधक आत्मपरीक्षण करत नाहीत, तोपर्यंत त्यांची दुर्दशा होत राहील, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी निवडणूक निःपक्ष नव्हती, असे सांगून पराभवाचे खापर फोडले. तर शरद पवार यांनी पैसे वाटून निवडणूक जिंकली, असा आरोप केला. त्यावर फडणवीसांनी टोला लगावला की, निवडणुकीत जो जिंकतो तोच सिकंदर असतो. पराभव स्वीकारण्याची तयारी हवी. चुका मान्य करून आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. पण विरोधक हे करत नाहीत. फडणवीस म्हणाले की, सर्व पक्षांना योजना राबवण्याची संधी होती. आम्ही लोकांसाठी योजना आणल्या. त्या लोकांना आवडल्या. त्यामुळेच लोकांनी आम्हाला निवडून दिले. आमच्यावर प्रेम केले. तसेच अजित पवार यांनी अमित शाह यांची घेतलेली भेट राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेत विरोधक एकत्र लढतात की स्वतंत्र, यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या जनतेचा महायुतीवर असलेला विश्वास आहे. कोण कसे लढते, हा त्यांचा प्रश्न आहे, असे फडणवीस म्हणाले. योजनेतील निधीवरून शरद पवारांचा सवाल बिहार निवडणुकीदरम्यान महिलांच्या खात्यात १०,००० रुपये जमा करण्याच्या सरकारी योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, निकालांवरून दिसते की महिलांनी निवडणुकीत उत्साहाने भाग घेतला. निवडणूक आयोगाने अशा निधी वाटपाला परवानगी का दिली?, सरकारी निधी मतदानावर प्रभाव पाडण्यासाठी वापरला गेला तर लोकशाहीवरील विश्वासाला तडा जाण्याचा धोका आहे. हा एक भ्रष्टाचारच आहे, असेही पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 6:36 am

पुरात खरडलेल्या जमिनीसाठी माती, मुरुम मोफत मिळणार

जमिनीच्या सुपीकतेसाठी महसूलमंत्र्यांचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने पूरग्रस्त शेतक-यांसाठी आज महत्त्वाचा निर्णय घेतला. यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतक-यांच्या खरडलेल्या शेतजमिनीसाठी मोफत माती, गाळ, मुरूम आणि कंकर दिला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. जमिनीच्या सुपीकतेसाठी महसूल मंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतला. पूरग्रस्त जमिनीसाठी गौण खनिजे इत्यादींवर रॉयल्टी माफ करण्यात येणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या […] The post पुरात खरडलेल्या जमिनीसाठी माती, मुरुम मोफत मिळणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 12:57 am

उपमुख्यमंत्री अजित पवार अमित शहा यांच्या भेटीला

पार्थ पवारच्या मुद्यावरून चर्चा झाल्याची माहिती नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीत अजित पवार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री पवार दिल्ली दौ-यावर होते. यावेळी त्यांनी ही भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यान इतर विषयांसह पार्थ पवार प्रकरणीही चर्चा झाल्याचे […] The post उपमुख्यमंत्री अजित पवार अमित शहा यांच्या भेटीला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 12:54 am

जम्मू-काश्मीरमध्ये भीषण स्फोट, ९ ठार

स्फोटकाचे नमुने गोळा करीत असताना स्फोट श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये काल भयावह स्फोट झाला. यात ९ ठार तर ३२ जण जखमी झाले. त्यांच्यावर ९२ आर्मी बेस आणि एसकेआयएमएस सौरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिका-यांच्या मते, व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल प्रकरणासंदर्भात जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने पोलिस गोळा करत असताना हा […] The post जम्मू-काश्मीरमध्ये भीषण स्फोट, ९ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 12:51 am

महाराष्ट्रात थंडी आणखी वाढणार

तापमानात लक्षणीय घसरण, आणखी घसरण वाढणार मुंबई : प्रतिनिधी नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. हवेत चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. किमान तापमानाच्या पा-यात बदल होत आहे. राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांपासून मराठवाड्यापर्यंत पुढील काही दिवसांत तापमानात लक्षणीय घसरण होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला. ईशान्येकडून सतत येणा-या गार हवेमुळे […] The post महाराष्ट्रात थंडी आणखी वाढणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 12:46 am

एआय तंत्रज्ञानामुळे देशात २ कोटी नोक-या धोक्यात

मुंबई : प्रतिनिधी भारतातील मध्यमवर्गीय रोजगाराला मोठा फटका बसू शकतो, असा गंभीर इशारा आंतरराष्ट्रीय आर्थिक तज्ज्ञांनी दिला आहे. देशातील रोजगार बाजारात सध्या ज्या प्रकारचे बदल होत आहेत, त्यातून सुमारे २ कोटी नोक-या पुढील काही वर्षांत गमावल्या जाऊ शकतात, असे विश्लेषकांचे मत आहे. हा धक्का आर्थिक मंदीमुळे नव्हे तर जागतिक व्यापारातील अस्थिरता, एआय तंत्रज्ञानाचा वेगाने वाढणारा […] The post एआय तंत्रज्ञानामुळे देशात २ कोटी नोक-या धोक्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 12:41 am

शुभमन गिल स्ट्रेचरवरून रुग्णालयात

कोलकाता : वृत्तसंस्था शुभमन गिलवर आता थेट हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वेळ आली. शुभमल गिलला स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यामुळे आता शुभमन गिल इडन गार्डन्सवर सुरु असलेला पहिला कसोटी सामना खेळणार की नाही, याबाबतची माहिती समोर येत आहे. शुभमन गिल शनिवारी फलंदाजीला आला खरा, पण तो फक्त चारच धावा करू शकला. कारण चार धावा केल्यावर त्याच्या […] The post शुभमन गिल स्ट्रेचरवरून रुग्णालयात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 12:38 am

मुलीचे लग्न साखरपुड्यापेक्षा टोलेजंग करणार!:इंदुरीकर महाराजांचे टीकाकारांना उत्तर, म्हणाले - त्रास देण्यालाही मर्यादा असतात

मुलीच्या साखरपुड्याच्या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च केल्यामुळे कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज टीकेचे धनी झाले.'बोलण्याप्रमाणे वागले नाहीत' अशी टीका त्यांच्यावर होत असताना, संतप्त इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनातून या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. साखरपुड्यापेक्षा मुलीच्या लग्नाचा 'बार' मोठ्या धुमधडाक्यात उडवणार असल्याचे त्यांनी टीकाकारांना ठणकावून सांगितले. गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर इंदुरीकरांच्या मुलीच्या साखरपुड्याचे व्हिडिओ चर्चेत होते. आपल्या कीर्तनातून साधेपणाचे रामबाण धडे देणारे महाराज स्वतःच्या मुलीच्या सोहळ्यात लाखो रुपये खर्च करण्यावरून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले. नेटकऱ्यांनी इंदुरीकर महाराज ‘दुटप्पीपणा’ करत असल्याचा आरोप केला. या टीकेमुळे त्रस्त झालेल्या इंदुरीकरांनी कीर्तनसेवा सोडण्याचे संकेतही दिले होते. आता या टीकेला इंदुरीकरांनी एका कीर्तनातून दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. नेमके काय म्हणाले इंदुरीकर महाराज? या टीकेला उत्तर देताना इंदुरीकर महाराज प्रचंड संतापलेले दिसले. अनेक जण माझ्या मुळावर उठणार, हे मला माहिती होते. त्या औलादींना मी सांगतो. मुलीचे लग्न याच्यापेक्षा टोलेजंग करणार आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त करत टीकाकारांना ठणकावून सांगितले. यावेळी इंदुरीकर महाराजांनी राजकारण्यांवरही टीका केली. तीस मिनिटांच्या सभेसाठी राजकारणी तीन कोटी खर्च करतात, तेव्हा कुणी काही बोलत नाही. ते पैसे कुठून आणले? हे देखील माध्यम प्रतिनिधी त्यांना विचारीत नाही, असे म्हणत त्यांनी निवडणुकीच्या काळात आता पैशाचा तमाशा सुरूच होईल, असे सांगितले. टीकाकारांना मर्यादा पाळण्याचा इशारा हे लोक विकले गेलेले आहेत. केवळ दुसऱ्यांना त्रास देणे हेच यांचे काम राहिले आहे. दुसऱ्याला त्रास देण्यालाही मर्यादा असतात. माझ्यापर्यंत ठीक होते, परंतु लोक माझ्या कुटुंबावर बोलत आहेत. माझ्या मुलीच्या अंगावरील ड्रेसपर्यंत काही लोक गेले आहेत. आता डोक्यावरचा फेटा खाली ठेवायची वेळ आली आहे, असे इंदुरीकर महाराज म्हणालेत. दरम्यान, कीर्तनातून 'साधी लग्न करा, कर्ज काढू नका' असा आग्रह धरणाऱ्या महाराजांनी स्वतःच्या मुलीच्या सोहळ्यात केलेल्या खर्चावरून त्यांना 'बोले तैसा चाले' या उक्तीवर न वागल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले आहे. मात्र, आता इंदुरीकर महाराजांनी टीकाकारांना दिलेल्या उत्तरामुळे टीकाकाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहावे लागणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 11:29 pm

नगरपालिका निवडणुकीसाठी कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही:संकेतस्थळावर केवळ माहिती भरावी, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची माहिती

जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना संकेतस्थळावर केवळ नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. यासोबत कोणतेही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही, अशी माहिती जिल्ह्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे. भरलेल्या नामनिर्देशनपत्राची आणि शपथपत्राची छापील प्रत (प्रिंटआऊट) घेऊन त्यावर सही करून, आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष आणि सदस्यपदासाठी नामनिर्देशपत्रे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. उमेदवारांनी या संकेतस्थळावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर परिपूर्ण माहिती भरल्यानंतर, त्याची मुद्रित प्रत (प्रिंट आऊट) काढून त्यावर उमेदवाराची स्वतःची व सूचकांची स्वाक्षरी घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर ही प्रिंट पुरक कागदपत्रांच्या मूळ प्रतींसह (उदा. नगरपरिषद/नगरपंचायतीचे नादेय प्रमाणपत्र, शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र, निवडणुकीसाठी बँक खात्याचा तपशील, राखीव जागांवरील उमेदवार असल्यास जातप्रमाणपत्र, पक्षाचा उमेदवार असल्यास ‘जोडपत्र-१’ किंवा ‘जोडपत्र-२’ इत्यादी) संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांसाठी नोंदणीसाठी सुरू केलेले संकेतस्थळ १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत २४ तास सुरू राहील. उमेदवारांनी नोंदणी करताना तयार केलेला लॉगिन आयडी व पासवर्ड जपून ठेवावा, कारण नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरण्यासाठी तो आवश्यक असतो. सही केलेल्या प्रिंटआऊटसह आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांचा संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विहित मुदतीत, म्हणजेच १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 10:34 pm

संतोष काकडे अमरावतीचे नवे निवासी उपजिल्हाधिकारी:अनिल भटकर मूळ पदावर परतणार, पाच तहसीलदारांच्याही बदल्या

चिखली (जि. बुलडाणा) येथील तहसीलदार संतोष काकडे यांची पदोन्नतीनंतर अमरावती येथे निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे अनिल भटकर आता पूर्णवेळ अमरावतीचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) म्हणून काम पाहतील. यासोबतच भातकुली, अचलपूर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासनातील अशा पाच तहसीलदारांच्याही बदल्या झाल्या आहेत. संतोष काकडे लवकरच आरडीसी पदाची सूत्रे हाती घेतील. त्यांनी यापूर्वी अमरावतीचे तहसीलदार म्हणूनही कामकाज सांभाळले आहे. अनिल भटकर गेल्या वर्षभरापासून अमरावतीचे एसडीओ असतानाच निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. त्यांनी प्रभारी असतानाही आरडीसी पदाला पूर्ण न्याय दिला, अशी प्रतिक्रिया महसूल विभागातून व्यक्त होत आहे. बदली झालेल्या तहसीलदारांमध्ये भातकुलीचे तहसीलदार अजीतकुमार येळे यांचा समावेश आहे, ज्यांना यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले आहे. चांदूर रेल्वेचे रुपेश खंडारे यांची अकोला येथे भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागातील प्रज्ञा काकडे यांची संतनगरी शेगाव येथे तहसीलदार म्हणून बदली झाली आहे. नायब तहसीलदार संवर्गातून पदोन्नती मिळालेले अक्षय मंडवे हे भातकुलीचे नवे तहसीलदार असतील. वरुड येथील पदोन्नतीप्राप्त नायब तहसीलदार सुदर्शन सहारे हे अचलपूरचे नवे तहसीलदार म्हणून जबाबदारी स्वीकारतील. चांदूर रेल्वेचे सुधाकर अनासने यांचीही बदली झाली असून, त्याठिकाणी नवीन अधिकारी कोण येणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने गेल्या दोन दिवसांत महसूल विभागातील सुमारे १५० तहसीलदारांना पदोन्नतीने उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्त केले आहे. यामध्ये अमरावती विभागातील ११ अधिकारी आणि जिल्ह्यातील पाच तहसीलदारांचा समावेश आहे. याशिवाय, इतर मागास बहुजन विकास विभागात सहायक संचालक असलेले तहसीलदार गजेंद्र मालठाणे यांना पदोन्नतीने अकोला येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. अचलपूरचे तहसीलदार डॉ. संजय गरकल यांच्याकडे अकोला येथील महाबीजच्या कार्यालयात महाव्यवस्थापक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 10:27 pm

जिल्हा परिषद मतदार यादी प्रकाशन पुन्हा लांबणीवर:आयोगाच्या पत्रामुळे 11 तारखेचे अंतिम प्रकाशन आता 24 नोव्हेंबरला

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठीच्या मतदार यादीच्या अंतिम प्रकाशनाला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही यादी आगामी २४ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाईल. यामुळे अमरावती जिल्ह्यातील ५९ जिल्हा परिषद आणि ११८ पंचायत समिती मतदारसंघांतील मतदारांची नेमकी संख्या त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांच्या स्वाक्षरीने दोन दिवसांपूर्वी एक पत्र जारी करण्यात आले. या पत्रामुळे ११ नोव्हेंबर रोजी यादी घोषित करण्याच्या तयारीत असलेले जिल्हा प्रशासन अचानक थांबले असून, आता अधिकारी व कर्मचारी २४ नोव्हेंबरच्या तयारीला लागले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या जुन्या वेळापत्रकानुसार, जिल्हा परिषदेची प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी घोषित करण्यात आली होती. त्यानंतर १४ ऑक्टोबरपर्यंत या यादीवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या. या हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या (SDO) स्तरावर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीअंती सुधारणा केलेल्या अंतिम मतदार यादीची घोषणा २७ ऑक्टोबर रोजी अपेक्षित होती. मात्र, आयोगाने ऐनवेळी ३ नोव्हेंबर ही नवी तारीख दिली. अमरावती वगळता राज्यातील इतर काही जिल्ह्यांचे कामकाज पूर्ण न झाल्याने ३ नोव्हेंबरलाही यादीची घोषणा झाली नाही. त्यानंतर ११ नोव्हेंबर ही नवी तारीख देण्यात आली होती. आता पुन्हा ती तारीख २४ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याचे आयोगाने कळवले आहे. या वाढीव मुदतीचे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. नागरिकांकडून आता चौथ्यांदा मुदतवाढ देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदार यादी जाहीर होण्याकडे जिल्हाभरातील नागरिकांचे आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक उमेदवाराला त्याच्या मतदारसंघातील मतदारांचा नेमका आकडा जाणून घ्यायचा आहे. प्रारूप मतदार यादीत सुमारे १५ लाख ३३ हजार मतदार आहेत. एकूण मतदारांच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही, परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या जाणून घेण्यासाठी आता आणखी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 10:24 pm

वर्ध्यात सुरु होता बनावट चलनी नोटा छापखाना:बिंग फुटले मालेगावात, 5 लाखांची रोकड जप्त; एक जण ताब्यात, मुख्य आरोपी फरार

बाहेर जिल्ह्यातील आरोपी हा वर्ध्यातील केजाजी चौक, गौंड प्लॉट परिसरात भाडेतत्त्वावर राहून, त्याने तिघांची मदत घेऊन चक्क बनावट चलनी नोटांचा छापखाना सुरु केले होता. त्या नोटा चलनात आल्या आणि त्यांचे बिंग नाशिक व मालेगावात फुटले आणि दोन आरोपींसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई एलसीबी व शहर पोलिसांनी केली. मालेगावात फुटले बिंग वर्ध्यातील केजाजी चौक, गौंड प्लॉट परिसरात मुख्य आरोपी ईश्वर लालसिंग यादव हा सहा महिन्यांपासून भाड्याने राहात होता. त्याने धनराज धोटे, राहुल आंबटकर आणि एका अल्पवयीन बालकाच्या मदतीने चलनात बनावट नोटा छापण्याचा धंदा सुरू केला होता. ऑनलाईन कागद खरेदी करून लहान मुद्रण यंत्राच्या मदतीने या नोटा तयार केल्या जात होत्या. या बनावट नोटा बाहेरच्या जिल्ह्यातील आठवडी बाजारात चलनात आणण्यासाठी आरोपी धनराज धोटे आणि राहुल आंबटकर यांना नाशिक व मालेगाव येथे पाठवण्यात आले. तेथेच त्यांचे बिंग फुटले आणि मालेगाव पोलिसांनी त्या दोघांना पकडले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी वर्ध्यात बनावट नोटांचा छापखाना सुरू असल्याची माहिती दिली. वर्ध्यात पोलिसांची कारवाई मालेगाव पोलिसांनी तात्काळ या घटनेची माहिती वर्ध्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांना दिली. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी आणि वर्धा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष ताले यांनी तीन पथके तयार करून गोंड प्लॉट परिसरात रात्री उशिरा (१२:३० वाजता) छापा टाकला. छाप्यादरम्यान घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एका भाडेकरूंच्या खोलीतून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये १४४ बनावट ५०० रुपयांच्या नोटा (एकूण ७२,००० रुपये), प्रिंटर, विविध आकारांच्या लाकडी व काचेच्या फ्रेम, ए-४ साईज पेपर, इंक बॉटल आणि छपाईसाठी लागणारे इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी फरार, तपास सुरू दरम्यान, साथीदार अटकेत गेल्याची माहिती मिळताच मुख्य आरोपी ईश्वर लालसिंग यादव काही महत्त्वाचे पुरावे घेऊन फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (क्र. १६५५/२०२५) दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कलम १७८(३)(४), १७९, १८०, ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुख्य आरोपी जेरबंद झाल्यावर आणखी किती नोटा चलनात आल्या, याची माहिती मिळणार असल्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 10:07 pm

हिंगोलीत शेतकऱ्याच्या घराला भीषण आग:ट्रॅक्टरच्या हप्तासाठीची 5 लाखांची रोकड जळून खाक, संसारोपयोगी साहित्यही भस्मसात

औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडा तांडा येथे एका शेतकऱ्याच्या घराला आग लागून ५ लाख रुपयांची रोकड, शेतीमाल व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. शनिवारी ता. १५ दुपारी हि घटना घडली आहे. औंढा नागनाथ तहसील कार्यालयाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. शॉर्ट सर्किटमुळे हि घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडातांडा येथे शेतकरी वसंत राठोड यांचे घर आहे. घरी शेती कामासाठी घेतलेले ट्रॅक्टर व हळद शिजविण्यासाठी घेतलेल्या कुकरचा हप्ता भरण्यासाठी त्यांनी बँकेतून ५ लाख रुपयांची रोकड काढली होती. सदर रक्कम त्यांनी घरात कपाटामध्ये व एका डब्यात ठेवली होती. दरम्यान, आज सकाळीच राठोड कुटुंबिय शेतात कामासाठी गेले होते. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांच्या घरातून अचानक धुर निघत होता. पाहता पहता घरातून आगीच्या ज्वाला निघू लागल्या होत्या. घराला आग लागल्याचे लक्षात येताच गावकरी गोपी राठोड, प्रदीप जाधव, विष्णू जाधव, सुभाष राठोड, अनिल राठोड, पृथ्वीराज राठोड, मुरलीधर राठोड, सुंदर राठोड यांच्यासह गावकरी घटनास्थळी धावले. गावकऱ्यांनी मिळेल त्या साहित्याने आगीवर पाणी ओतण्यास सुरवात केली. तर वसंत राठोड व त्यांचे कुटुंबिय घरी आले. आग नियंत्रणात येई पर्यंत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. यामध्ये पाच लाख रुपयांची रोकड, सोयाबीन सह इतर शेतीमाल, संसारोपयोगी साहित्याचा समावेश आहे. या घटनेमुळे राठोड कुटुंबीय उघड्यावर आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार हरिष गाडे यांनी तातडीने महसूल विभागाचे पथक घटनास्थळी रवाना केले. या पथकाने नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 9:48 pm

नागपुरात भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या:हल्लेखोरांकडून धारदार शस्त्रांनी सपासप वार, मुलाच्या वाढदिवशीच दुर्दैवी अंत

उत्तर नागपुरातील भाजपच्या एका वॉर्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. यशोधरा नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कांजी हाऊस परिसरात धारदार शस्त्रांनी सपासप वार करून ही क्रूर हत्या करण्यात आली. सचिन साहू असे हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव असून, ते उत्तर नागपुरातील वॉर्डचे अध्यक्ष होते.जुन्या पैशांच्या देवाण-घेवाणीतून हा खून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (शनिवार) मृतक सचिन साहू यांच्या मुलाचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या तयारीसाठी आवश्यक असलेले साहित्य आणण्यासाठी सचिन घराबाहेर पडले होते, मात्र, वाटेतच कांजी हाऊस परिसरात दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी मिळून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर चौघेही फरार झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर यशोधरा नगर पोलिस ठाण्यात साहू यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. हत्येमागचे कारण काय? सचिन साहू यांची हत्या करणारे मारेकरी नेमके कोण होते आणि हत्येमागे नेमके कारण काय होते, याचा तपास सध्या यशोधरा नगर पोलिस करत आहेत. जुन्या पैशांच्या वादातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, कुटुंबीयांकडून वेगळाच संशय व्यक्त करण्यात आला आहे. साहू यांचा गणेशोत्सात काही लोकांशी वाद कुटुंबीयांनी सचिन साहू यांच्या हत्येमागे पूर्ववैमनस्य असल्याचा संशय व्यक्त केला आहे. गणपती उत्सवादरम्यान सचिन साहू यांचा काही लोकांशी वाद झाला होता, त्या लोकांचा या हत्येत समावेश असू शकतो, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. पोलिस या दिशेनेही तपास करत आहेत. पोलिसांकडून तपास सुरू सध्या पोलिसांनी कांजी हाऊस परिसर आणि आजूबाजूच्या भागांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, मारेकऱ्यांचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. या भरदिवसा झालेल्या हत्येमुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या एका सक्रिय कार्यकर्त्याची भरदिवसा हत्या झाल्याने शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे मारेकऱ्यांच्या अटकेनंतर उलगडा होईल - पोलिस दरम्यान, सचिन साहूचे काही दिवसांपूर्वी गौर आणि प्रतिक नावाच्या दोन व्यक्तींशी भांडण झाले होते. त्यामुळे पोलीस दोन्ही बाजू तपासून पहात आहे. मारेकरी पळाले असल्याने त्यांच्या अटकेनंतरच खुनाच्या कारणांचा उलगडा होईल, असे परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितले. राजकीय वाद अथवा वैमनस्याचा विषय नाही साहू हे भाजपाचे वॉर्ड अध्यक्ष असले तरी त्यांच्या खुनामागे राजकीय वैमनस्य कारण नाही. हा त्यांचा आर्थिक वाद होता. साहू यांनी घेतलेल्या कर्जापैकी कर्जाच्या रकमेवरून त्यांचा काही जणांशी वाद होता, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे हा राजकीय वाद अथवा वैमनस्याचा विषय नाही, असे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 9:38 pm

जि. प. निवडणुकीतील नोडल अधिका-यांनी जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी

लातूर : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर नियुक्त सर्व नोडल अधिका-यांनी आपली कर्तव्ये आणि जबाबदा-या काळजीपूर्वक पार पाडाव्यात. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यांच्या बैठकीत त्या बोलत […] The post जि. प. निवडणुकीतील नोडल अधिका-यांनी जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 9:15 pm

दिवसात २२५ ई चलान केसेस करून १,७८,८५० रु पये दंड

लातूर : प्रतिनिधी लातूर शहरातील नियम बा वाहनावर बेशिस्त पार्क करणारे चार-चाकी, दुचाकी वाहनावर तसेच बेशिस्तपणे रिंग रोडचे सर्व्हिस रोडवर वाहन पार्कीग करणारे वाहनावर वाहतुक नियंत्रण शाखा, लातूर यांचेकडून ई-चलान मशिनव्दारे दंडात्मक कार्यवाहीची १५ दिवस विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. एका दिवसात २२५ ई चलान केसेस करुन १ लाख ७८ हजार ८५० रुपयांचा दंड आकारण्यात […] The post दिवसात २२५ ई चलान केसेस करून १,७८,८५० रु पये दंड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 9:13 pm

९३ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान

लातूर : प्रतिनिधी विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने प्रभाग क्रमांक १७ मध्ये सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा यशस्वी समारोप सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणा-या ९३ महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद […] The post ९३ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 9:11 pm

सोयाबीन हमीभाव खरेदीला पोर्टलचा खोडा

लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी ऑनलाइन बुकिंग ३० ऑक्टोबरपर्यंत करुन घेतली. प्रत्येक्ष खरेदी दि. १५ नोव्हेंबर रोजी सुरु होणार होती. परंतू, पोर्टलने खोडा घातल्याने पहिल्या दिवशी सोयाबीनची हमीभावाने खरेदी झाली नाही. जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या सोयाबीन खरेदी केंद्रांवरील पोर्टल दुपारी १२.३० वाजता सुरु झाले. त्यामुळे केंद्र संचालकांनी शेड्युलिंग सुरु केली. परिणामी आज […] The post सोयाबीन हमीभाव खरेदीला पोर्टलचा खोडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 9:08 pm

पुण्यात 'कॅम्पफायर स्टोरीटेलिंग'चा गिनीज विश्वविक्रम:ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने रचला इतिहास; 4 हजार 623 श्रोत्यांनी ऐकल्या शिवकथा

पुण्यात ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने (DPES) 'कॅम्पफायर स्टोरीटेलिंगमध्ये सर्वात मोठा श्रोतवृंद' असा नवीन गिनीज विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. खराडी कॅम्पसमध्ये आयोजित या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा सांगण्यात आल्या. या कथाकथन कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या १२ किल्ल्यांशी संबंधित कथा सांगितल्या. या किल्ल्यांना नुकतेच युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे. खराडी कॅम्पसमध्ये तयार केलेल्या एका मोठ्या शेकोटीभोवती आयोजित या कार्यक्रमात तब्बल ४६२३ श्रोत्यांनी सहभाग नोंदवला. यात विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचा समावेश होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे वरिष्ठ ॲडज्युडिकेटर प्रवीण पटेल यांनी लंडनहून येऊन या विक्रमाची पाहणी केली. त्यांच्या हस्ते ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील यांना विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या उपक्रमाबद्दल बोलताना सागर ढोले पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत स्थान मिळाल्यानंतर, या किल्ल्यांचे महत्त्व आणि शिवरायांचे कर्तृत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने आम्ही हा उपक्रम हाती घेतला. ते पुढे म्हणाले की, कॅम्पफायर स्टोरीटेलिंग ही संकल्पना जगभरातील गिर्यारोहकांमध्ये लोकप्रिय आहे. या श्रेणीत गिनीज विश्वविक्रम केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या अद्वितीय किल्ल्यांची माहिती देशांतर्गत तसेच देशाबाहेरील गिर्यारोहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने एका वर्षाच्या आत केलेला हा तिसरा गिनीज विश्वविक्रम आहे. यापूर्वी, ८ तासांमध्ये १००० व्यक्तींना कृत्रिम अवयव बसवणे आणि गणेशोत्सवादरम्यान १७२४ नागरिकांच्या सहभागाने दिवे ओवाळून एकत्रित आरती करणे, असे दोन विश्वविक्रम संस्थेने प्रस्थापित केले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 8:12 pm

नवले पूल अपघात:वाहतूक सुधारणा, वेगमर्यादा निश्चित; मुरलीधर मोहोळांचे विविध यंत्रणांना महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश

पुणे शहरातील नवले पूल अपघात प्रकरणानंतर अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात. त्याअनुषंगाने विविध यंत्रणांवरची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. वाहतूक विषयक सुधारणा, वेगमर्यादा, तसेच सेवा रस्त्यांच्या कामातील भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावून महिनाभरात अहवाल सादर करण्याच्या सूचना केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या आहेत. नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, तर नऊ ते दहा जण जखमी झाले होते. या घटनेनंतर मुरलीधर मोहोळ यांनी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसराला भेट दिली. त्यानंतर शनिवारी शासकीय विश्रामगृहात त्यांनी विविध यंत्रणांमधील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डाॅ. योगेश म्हसे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, राज्य महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मोहोळ म्हणाले की, नवले पूल अपघात प्रकरणानंतर दीर्घकालीन उपाययोजनांसह अनेक पावले उचलली जातील. नऱ्हे ते रावेत दरम्यान उन्नत मार्ग बांधण्याचा आराखडा मंजूर झाला असून, याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. जांभुळवाडी ते वारजे परिसरापर्यंत वर्तुळाकार मार्ग निश्चित करण्यात आला आहे, ज्यावरून वाहतूक वळवली जाऊ शकते. हे काम सुरू करण्यासाठीही पाठपुरावा करण्यात येणार आहे. दरी पूल ते वडगाव बुद्रुक दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी तीन स्पीड गन आहेत, त्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. स्वामी नारायण मंदिर ते नवले पूल दरम्यानच्या तीव्र उतारावर गतिरोधक पट्ट्या (रम्बलिंग स्ट्रिप) बसवण्यात आल्या आहेत. तीव्र उतारावर वेग कमी करण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जड वाहनांसाठी वेगमर्यादा प्रतितास ६० किलोमीटरवरून ३० किलोमीटर करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध जागेवरच कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. विविध यंत्रणांनी याबाबत केलेल्या कामाचा अहवाल महिनाभरात सादर करावा. डिसेंबर महिन्यात कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक निश्चित करण्यात आली आहे, असे मोहोळ यांनी नमूद केले. बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर टोलनाका येथे ट्रक आणि कंटेनर चालकांची तपासणी करण्यात येणार आहे. जड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल आढळल्यास तो जागेवरच उतरवण्यात येणार आहे. जड वाहनांची तांत्रिक, तसेच ब्रेक तपासणी करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध ई-चलनाद्वारे कारवाई करण्यात येते. दरी पूल ते वडगाव बुद्रुक परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जड वाहनांविरुद्ध जागेवरच कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत’, असे मोहोळ यांनी सांगितले.‘भूसंपादनामुळे बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यांचे काम रखडले आहे. पाषाण भागात संरक्षण विभागाची जागा आहे. सेवा रस्त्यासाठी संरक्षण विभागाची जागा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. सेवा रस्त्यावर पीएमपी बस, तसेच खासगी वाहतूकदारांचे थांबे आहेत. हे थांबे बेकायदा आहेत. प्रवाशांची सुरक्षा विचारात घेऊन थांबे बांधले पाहिजेत. बाह्यवळण मार्गावरुन दररोज साडेतीनशे पीएमपी बसच्या फेऱ्या जातात. सेवा रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करावी’, असे आदेश मोहोळ यांनी दिले.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 8:05 pm

सायबर चोरट्यांकडून 33 लाखांची फसवणूक:पुणे शहरात ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाने प्रकार

पुणे शहरात सायबर चोरट्यांनी ऑनलाइन गुंतवणूक आणि घरातून काम करण्याच्या आमिषाने नागरिकांची ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये ही फसवणूक झाली असून, याप्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विश्रांतवाडी येथील एका नागरिकाला ऑनलाइन टास्कद्वारे घरातून काम करण्याची संधी देण्याचे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला परतावा मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना अधिक पैसे गुंतवण्यास सांगितले. यातून त्यांची १९ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे अधिक तपास करत आहेत. याशिवाय, शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका महिलेची सायबर चोरट्यांनी ६ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केली. वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील तपास करत आहेत. पर्वती भागातही अशाच प्रकारे शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका नागरिकाची ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक एस. कोपनर या प्रकरणाचा तपास करत आहेत. खासगी कंपनीतील कामगाराकडून रोकड चोरी खासगी कंपनीतील कामगारने मालकाचे लक्ष नसल्याची संधी साधून एक लाख ४४ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी कामगाराविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात खासगी कंपनी आहे. कंपनीतील कामगाराने मालकाचे लक्ष नसल्याची संधी साधली. गल्ल्यात ठेवलेली एक लाख ४४ हजारांची रोकड चोरून नेली. रोकड चोरल्यानंतर कामगार कंपनीत आला नाही. मालकाने कामगाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कामगाराने रोकड चोरल्याचा संशय कंपनी मालकाने फिर्यादीत व्यक्त केला आहे. पोलीस कर्मचारी पाटील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 8:01 pm

मुंबईत मुलांच्या नेतृत्वाखालील स्वच्छता मोहीम:90 मिनिटांत 350 पिशव्या कचरा जमा, प्रभादेवी-जुहू किनाऱ्यावर शाळकरी 'ग्रीन चॅम्प्स'ची कमाल

मुंबई क्लायमेट वीक 2025 च्या महत्त्वपूर्ण उपक्रमांचा एक भाग म्हणून प्रोजेक्ट मुंबईच्या वतीने जल्लोष क्लीन कोस्ट्स यांनी 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते 9.00 वाजेपर्यंत प्रभादेवी आणि जुहू कोळीवाडा किनारपट्टीवर मुलांसाठी खास बीच क्लीन-अप मोहीम राबवली. सकाळी लवकरच शहराच्या किनाऱ्यांवर पोहोचलेल्या शाळकरी मुलांच्या उत्साहामुळे संपूर्ण किनारपट्टीत नवा जोश निर्माण झाला. हातमोजे घालून, अमर्याद ऊर्जा आणि जबाबदारीची भावना बाळगून या छोट्या ‘ग्रीन चॅम्प्स’नी स्वच्छतेचे काम हाती घेतले. शिक्षक, स्वयंसेवक आणि स्थानिक समुदायाच्या साथीत या मुलांनी एकत्रित प्रयत्नांनी शहरासाठी काय बदल घडवता येऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण घालून दिले. केवळ 90 मिनिटांत मुलांनी 350 हून अधिक पिशव्यांमध्ये प्लास्टिक कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण केले—मुंबईच्या सागरी पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांची असलेली निष्ठा यावरून स्पष्ट होते. गोळा केलेला सर्व प्लास्टिक कचरा आता प्रोजेक्ट मुंबईच्या माध्यमातून पुनर्वापरासाठी पाठवण्यात येणार असून त्यापासून टी-शर्ट, बाक, कंपास बॉक्स आणि इतर उपयुक्त वस्तू तयार केल्या जातील. यामुळे कचऱ्याचे ‘किमती वस्तूंमध्ये’ रूपांतर कसे होते, याचा थेट अनुभव मुलांना मिळणार आहे. मुंबई क्लायमेट वीकचा एक भाग म्हणून आयोजित केलेला जल्लोषचा हा विशेष उपक्रम म्हणजे मुलांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या हवामान कृतीचा उत्सवच ठरला. यामुळे मुंबई क्लायमेट वीकचे उद्दिष्ट—विशेषतः मुलांमध्ये जागरूकता वाढवून, अधिक स्वच्छ, दयाळू आणि हवामान-तयार मुंबई घडवण्यासाठी नागरिकांना सक्षम करणे—याला अधिक बळ मिळाले.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 7:44 pm

लालू यादवांच्या कुटुंबात दुफळी; अखेर लेकीने तोडले संबंध

पाटणा : वृत्तसंस्था बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या दारुण पराभवानंतर यादव कुटुंबात दुफळी निर्माण झाली आहे. लालू यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी ट्विट करत कुटुंबाशी संबंध तोडण्याचा निर्णय जाहीर केला. एका पोस्टमध्ये त्यांनी राज्यसभा खासदार संजय यादव यांचा उल्लेख करत म्हटले आहे की, ‘मी सर्व दोष स्वत:वर घेत आहे. आचार्य यांनी लिहिले आहे की, मी […] The post लालू यादवांच्या कुटुंबात दुफळी; अखेर लेकीने तोडले संबंध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 7:41 pm

बांगलादेशात तिस-या दिवशी हिंसाचार; कडेकोट सुरक्षा

ढाका : वृत्तसंस्था बांगलादेशची राजधानी ढाका येथे सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जाळपोळ आणि हिंसाचारानंतर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे समर्थक ढाकासह पाच जिल्ह्यांमध्ये निदर्शने करीत असून महामार्ग रोखले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारने शहरात बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या १२ अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या आहेत, ज्या सतत गस्त घालत […] The post बांगलादेशात तिस-या दिवशी हिंसाचार; कडेकोट सुरक्षा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 7:39 pm

विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत अधिकार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

जयपूर : वृत्तसंस्था राजस्थान उच्च न्यायालयाने निकालपत्रात कौटुंबिक मालमत्ता आणि विवाहित मुलांचे अधिकार यावर मोठे स्पष्टीकरण दिले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, कोणताही प्रौढ आणि विवाहित मुलगा किंवा मुलगी त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत त्यांची परवानगी असल्याशिवाय राहण्याचा कायदेशीर हक्क सांगू शकत नाही. न्यायालयाने कठोर भूमिका घेत, जर वडिलांनी दिलेली राहण्याची परवानगी परत घेतली तर मुलाला किंवा […] The post विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत अधिकार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 7:38 pm

सिग्नल फ्रिक्वेन्सी युद्धासाठी भारतीय सेनादलाची तयारी?

मुंबई : वृत्तसंस्था चीन आणि पाकिस्तान भारताविरोधात रहस्यमयपणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्धाची तयारी करत आहेत का? अशी शंका निर्माण झाली आहे. भारताने मुंबई फ्लाइट इन्फॉर्मेशन रिजनमध्ये जीपीएस हस्तक्षेपाबाबत एक ‘नोटाम’ जारी केला. जो अरबी समुद्रापर्यंत पसरला आहे. हे क्षेत्र भारतातील सर्वात व्यस्त हवाई मार्गात येते. त्यामुळे या नोटामला इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध सुरू होण्याचे संकेत मानले जात आहेत. नवी […] The post सिग्नल फ्रिक्वेन्सी युद्धासाठी भारतीय सेनादलाची तयारी? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 7:37 pm

जेन-झेडला नोकरीतून मुदतपूर्व डच्चू मिळण्यात वाढ!

नवी दिल्ली : प्रतिनिधी सध्या जेन-झेड कर्मचा-यांवर कंपन्या फारसा विश्वास दाखवत नाहीत. अलिकडेच १ हजार मॅनेजरचा एक सर्व्हे करण्यात आला. त्यात ६ पैकी १ हायरिंग मॅनेजर जेन-झेड कर्मचा-याला नोकरीवर ठेवण्यास संकोच करत असल्याचे निदर्शनास आले. इंटेलिजेंट.कॉमद्वारे सप्टेंबरमध्ये प्रसृत केलेल्या सर्व्हेतून समोर आले की, ६० टक्के हायरिंग मॅनेजरने जेन-झेड कर्मचा-यांना नोकरी दिल्यानंतर काही महिन्यातच सेवामुक्त केले. […] The post जेन-झेडला नोकरीतून मुदतपूर्व डच्चू मिळण्यात वाढ! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 7:35 pm

आशियातील सर्वात मोठे मेट्रो कार शेड मंडाळेत! ७२ मेट्रोची क्षमता, २९ कि.मी.चा ट्रॅक

मुंबई : प्रतिनिधी मंडाळे येथे एकाच वेळी ७२ मेट्रो गाड्या उभ्या करण्याच्या क्षमतेचे आणि २९ किमी लांबीचा अंतर्गत ट्रॅक असलेले कारशेड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उभारले आहे. हे कारशेड आशियातील सर्वात मोठे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. लवकरच या कारशेडमधून मेट्रोचे संचलन सुरू होणार आहे. मेट्रो २ बी मार्गिका २३.६ किलोमीटर लांबीची असून, […] The post आशियातील सर्वात मोठे मेट्रो कार शेड मंडाळेत! ७२ मेट्रोची क्षमता, २९ कि.मी.चा ट्रॅक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 7:31 pm

पळसगाव येथे शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या त्या:कर्जाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद

वसमत तालुक्यातील पळसगाव येथे कर्जाला कंटाळून तसेच नापिकीमुळे शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी ता. १५ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पळसगाव येथील शेतकरी बाबुराव मिरकुटे (६०) यांना ३० गंुठे शेत आहे. या शेतातील उत्पन्नावर तसेच इतर मजूरीवर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. या शेतावर त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. खरीप हंगाम हाती आल्यानंतर कर्जाची परतफेड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. दरम्यान, यावर्षी त्यांनी शेतात सोयाबीन व इतर पिकांची पेरणी केली होती. मात्र पिक हाती आल्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिक वाहून गेले. हाती आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून गेल्यामुळे कर्ज कसे फेडावे तसेच कुटुंबाचा उदनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. खरीपाचे पिक हातचे गेले आता उदरनिर्वाह कसा करावा तसेच बँकेचे कर्ज कसे फेडावे याची चिंता लागल्याचे ते बोलून दाखवत होते. दरम्यान, बुधवारी ता. १२ शेतात जाऊन येतो असे सांगून ते घरून निघाले होते. शेतात गेल्यानंतर त्यांनी झाडाला गळफास घेतला. काही वेळानंतर त्यांचा नातू शेतात गेल्यानंतर त्याचे आजोबा बाबुराव यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतल्ेल्या स्थितीत आढळून आला. त्याने आरडा अोरड केल्यानंतर परिसरातील शेतकरी व गावकरी घटनास्थळी दाखल झाले. तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक एकनाथ डक, पी. व्ही. शेळके, जमादार भगवान आडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी विठ्ठल मिरकुटे यांच्या माहितीवरून आज वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक एकनाथ डक पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 7:16 pm

भाजपला फायदा करून देण्याची ‘सुपारी’ घेतली का?:काँग्रेसच्या 'स्वबळा'च्या भूमिकेवर शरद पवार गटाचा सवाल, बिहारचा धडा विसरल्याची टीका

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये अचानक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मुंबई काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथाला आणि अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याची एकतर्फी घोषणा करून महाविकास आघाडीतील समन्वयाचा भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे अनपेक्षितपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, याचा थेट फायदा भाजपला होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. शरदचंद्र पवार प्रदेश प्रवक्ते आणि युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी काँग्रेसच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ॲड. अमोल मातेले यांनी काँग्रेसच्या 'स्वबळा'च्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसच्या निर्णयाचा थेट आणि उघड फायदा भाजपला मुंबईसारख्या अत्यंत स्पर्धात्मक निवडणुकीतमतांचे विभाजन म्हणजे विरोधकांची तुकडेबाजी म्हणजे आणि अवाजवी अहंकारामुळे घेतलेल्या एकतर्फी भूमिकेमुळे भाजपला सोन्याची संधी मिळणार, हे वास्तव कोणत्याही राजकीय विश्लेषकाला स्पष्ट आहे, असे मातेले म्हणाले. महाविकास आघाडी एकत्र राहिल्यासच मजबूत पर्याय उभा राहतो, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. अशावेळी काँग्रेसचा स्वबळाचा निर्णय म्हणजे विरोधी मतांची विभागणी भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा मुंबईकरांच्या हिताचे प्रचंड नुकसान होईल, असे शरदचंद्र पवार प्रदेश प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी म्हटले आहे. बिहारचा धडा विसरलेली काँग्रेस बिहारमध्ये विरोधक विखुरले आणि सत्ताधाऱ्यांना सरळ बहुमत मिळाले. महाविकास आघाडी तुटली की परिणाम किती घातक होऊ शकतात, याचे ताजे उदाहरण बिहार आहे. मुंबईतही तेच चित्र निर्माण करण्याची भीषण चूक काँग्रेसच्या नेतृत्वाकडून होताना दिसते. आघाडीतील विश्वास, संवाद आणि सन्मान या तीनही गोष्टींना काँग्रेसच्या निर्णयाने धक्का बसला आहे. काँग्रेसमधील काही नेते गेल्या काही दिवसांत असमंजस भूमिका, आघाडीविरोधी वक्तव्ये आणि भाजपला अप्रत्यक्ष फायदा होईल असे निर्णय घेताना दिसत आहेत. म्हणूनच हा गंभीर प्रश्न उपस्थित होतो. काँग्रेसच्या ठराविक गटांनी पक्षाला कमकुवत करण्याची, आघाडी तोडण्याची आणि भाजपला फायदा करून देण्याची ‘सुपारी’ घेतली आहे का? हा प्रश्न फक्त राजकीय नाही. हा मुंबईकरांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न आहे, असा घणाघात अमोल मातेले यांनी काँग्रेस नेत्यांवर केला. शरद पवार पक्षाची भूमिका अधिक स्पष्ट आमची भूमिका ठाम आणि पारदर्शक आहे. मतांचे विभाजन कोणत्याही परिस्थितीत टाळणे, महाविकास आघाडीची एकता टिकवणे, तीनही पक्षांमध्ये संवाद आणि समन्वय वाढवणे आणि भाजपच्या विभाजनकारी कारभाराला रोखणे, यासह मुंबईकरांचा हितसंबंध हा आमचा केंद्रबिंदू आहे आणि आम्ही त्यासाठी पूर्ण बांधिलकीने उभे आहोत, असेही अमोल मातेले यांनी म्हटले. काँग्रेसने निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा काँग्रेसचा घेतलेला निर्णय घाईघाईत, भावनिक प्रतिक्रिया म्हणून, राजकीय वास्तवापासून पूर्णपणे दूर असा वाटतो. मुंबईकरांच्या हितासाठी, विरोधी मतसंघटन मजबूत ठेवण्यासाठी आणि भाजपच्या वाढत्या राजकीय आक्रमणाला रोखण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय तात्काळ पुनर्विचार करणे अत्यावश्यक आहे. मुंबईच्या हितासाठी महाविकास आघाडीची मजबुती अत्यंत महत्त्वाची आहे. काँग्रेसच्या निर्णयाने या एकतेला धक्का बसला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संवाद, समन्वय आणि आघाडी टिकवण्याच्या प्रयत्नात शेवटपर्यंत सक्षम आणि बांधिल आहे, असे अमोल मातेले यांनी म्हटले.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 7:03 pm

दोन्ही भाऊ एकत्र आले तरच मुंबई ताब्यात येईल:ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे विधान, बिहार निवडणुकीचा दाखला देत काँग्रेसलाही फटकारले

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना आणि प्रचाराला वेग येत असतानाच, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर मोठे विधान केले आहे. दोघे भाऊ एकत्र आले, तर मुंबई महापालिका आपल्या ताब्यात येईल, असे खैरे म्हणालेत. यासोबतच त्यांनी काँग्रेसला फटकारत, आघाडी धर्म पाळण्याचे आवाहन केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्रिभाषा सूत्राचा अध्यादेश रद्द झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रथमच एकाच व्यासपीठावर आले. या घटनेमुळेच आता ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील अनेकवेळा दोन्ही बंधु एकत्र येणार असल्याचे सुतोवाच केले. मात्र, याबाबत अद्याप दोन्ही पक्षांकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अशात या युतीच्या चर्चेवर आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. नेमके काय म्हणाले चंद्रकांत खैरे? चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे बंधुंच्या युतीबाबत अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. दोन्ही ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) एकत्र आले, तर त्यामुळे मोठा फरक पडेल आणि त्यामुळे मुंबई महापालिकेवर विजय मिळू शकेल, हे कोणीही नाकारू शकत नाही, असे खैरे म्हणाले. त्यांनी मुंबईच्या राजकारणाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना, ही मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे. त्यांच्यामुळेच मुंबई वाचलेली आहे, नाही तर या लोकांनी मुंबई कधीच तोडली असती, असेही नमूद केले. तेव्हाचे काँग्रेसचे सरकार असेल किंवा आताचे केंद्र सरकार असेल मुबई कशी काबीज करायची? असा त्यांचा प्रयत्न असतो. पण मराठी माणूस हा मराठी नेतृत्वाकडे पहात आहे, त्यामुळे दाव्याने सांगतो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका ताब्यात येऊ शकते, असा आत्मविश्वास खैरे यांनी व्यक्त केला. तडजोड न केल्यास भाजप डोक्यावर बसेल चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केवळ ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचे आवाहन केले नाही, तर सध्याच्या राजकीय परिस्थितीत तडजोड करण्याची गरजही व्यक्त केली. सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळे लढायला लागले आहेत, पण कुठेतरी ऍडजस्टमेंट करावी लागेल, कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. सध्या डाऊन फॉल सुरू असला तरी आपल्याला निवडून येण्यासाठी तडजोड करावी लागेल, नाही तर भाजपा पुन्हा डोक्यावर बसेल, असे ते म्हणाले. काँग्रेसला आघाडी धर्म पाळण्याचे आवाहन यावेळी चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसलाही फटकारले. काँग्रेसने अजूनही युतीचा निर्णय घेतला पाहिजे आणि आघाडी धर्म पाळला पाहिजे. काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढला तर कसा मजबूत होणार? असा सवाल त्यांनी केला. बिहारमध्ये किती जागा लढल्या पण एकच जागा आली. राहुल गांधी यांनी जी मतचोरी दाखवली त्याचा काहीच परिणाम बिहारमध्ये झाला नाही, असेही खैरे यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 6:40 pm

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुका:ऑफलाईन नामनिर्देशनपत्र रविवारीही स्वीकारणार, राज्य निवडणूक आयोगाची माहिती

राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजताच संभाव्य उमेदवारांची धावपळ वाढली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छूक उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असून, प्रक्रिया अधिक सोयीस्कर व्हावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीनेही रविवारी (ता. १६ नोव्हेंबर) नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार असल्याचे आयोगाने सांगितले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार,नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. ई-फायलिंगची सुविधा उपलब्ध असली तरी, मोठ्या प्रमाणावर उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहून ऑफलाईन नामनिर्देशन दाखल करणे पसंत करतात. यामुळे निवडणूक कार्यालयांमध्ये शेवटच्या दिवशी गर्दी होते. ही परिस्थिती टाळण्यासाठी आणि प्रक्रिया विनाअडथळा पार पडावी म्हणून रविवारची अतिरिक्त सोय करण्यात आली आहे. रविवारी सरकारी सुट्टी असली तरीही सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहे. याबाबत सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. सुट्टीच्या दिवशी उपलब्ध केलेली ही सोय उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. अनेक उमेदवारांना अखेरच्या दिवशी कागदपत्रे तपासणे, दुरुस्ती करणे, शपथपत्र तयार करणे, तसेच इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी वेळ अपुरा पडतो. त्यामुळे रविवारी उपलब्ध असलेल्या सुविधेचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही आयोगाने केले आहे. अर्ज भरण्यास १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. या नंतर कोणतेही नामनिर्देशन स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्रे, शपथपत्रातील सर्व माहिती, निवडणूक खर्चाशी संबंधित दस्तऐवज, तसेच आवश्यक सर्व परिशिष्टे योग्यरित्या तपासूनच दाखल करावीत, असे निर्देश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रक्रिया सुलभ करण्यासाठी निर्णय गेल्या काही निवडणुकांमध्ये नामनिर्देशन दाखल करण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची गर्दी होत असल्याचे दिसले होते. यामुळे निवडणूक कार्यालयांमध्ये ताणतणावाची परिस्थिती निर्माण होत होती. तसेच कागदपत्रांची आरपार तपासणी करणे, त्रुटी दुरुस्त करणे या प्रक्रियेस विलंब होऊन काही उमेदवारांचे नामनिर्देशन तांत्रिक कारणांमुळे बाद होण्याच्या घटना घडल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर आयोगाने यंदा विशेष दक्षता घेतली असून, प्रक्रिया सुलभ करण्यासाठी रविवारीही कार्यालये उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाचा निर्णय उमेदवारांसाठी सोयीचा राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये स्थानिक राजकीय वातावरण तापले आहे. विविध पक्षांकडून उमेदवार निवड प्रक्रिया सुरू असून, इच्छूक उमेदवार प्रत्यक्ष नामनिर्देशन दाखल करण्यासाठी उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत राज्य निवडणूक आयोगाचा हा निर्णय उमेदवारांना सोयीस्कर ठरणार आहे. विशेषतः सप्ताहांताचा वापर करून हजारो उमेदवार वेळेवर नामनिर्देशन दाखल करतील, अशी अपेक्षा निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 5:52 pm

एकीकडे कुटुंब जळत असताना मृतांच्या दागिन्यांची लुटालूट:अपघातानंतर मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार समोर; VIDEO

पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघाताने राज्यभरात हळहळ व्यक्त होत असताना, या दुर्घटनेनंतर घडलेला प्रकार समाजाला चक्रावून सोडणारा ठरला आहे. अपघातानंतर मदतकार्य करण्याऐवजी काही असंवेदनशील नागरिकांनी मृत आणि जखमींच्या सामानाची लुटालूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिकांची संवेदनशीलता हरवत चालली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. एका कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने त्याने अनेक वाहनांना धडक दिली. एक टुरिस्ट कार दोन कंटेनरमध्ये चेंगरली गेली आणि त्यानंतर कारने तात्काळ पेट घेतला. या भीषण अपघातात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 9 ते 10 जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर अपघातातील मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार समोर आला. कुटुंब आगीत जळत होते, काहीजण निर्लज्जपणे सोने लुटत होते अपघातानंतर काही कुटुंबीय मदतीची अपेक्षा करत असताना, दुसरीकडे काही स्वार्थी व्यक्तींनी सोन्याचे दागिने आणि रोकड गोळा करण्यासाठी धावाधाव केली. दोन ट्रकच्या भीषण धडकेनंतर परिसरात पडलेली रोकड, मौल्यवान वस्तू हडप करण्यासाठी लोकांनी स्पर्धाच लावली होती. अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये एकीकडे कुटुंब जळत असताना, काही लोक निर्लज्जपणे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटत होते. या अपघातात एका लहान मुलीसह कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाला होता. समाजभरातून सहवेदनेचा सूर उमटत असताना, काहींच्या निर्ढावलेल्या वागणुकीने संतापाची लाट उठली आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल या लुटमारीचे दृश्य दाखवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एका बाजूला अपघातातील मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, दुसऱ्या बाजूला अशाप्रकारे लुटालूट होण्याची घटना ही समाजाच्या नैतिक पतनाचे सूचक मानली जात आहे. ट्रकचालकासह तिघांवर गुन्हा दाखल दरम्यान, या अपघातास जबाबदार असलेल्या ट्रक चालक, मालकासह तीन जणांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातात ट्रक चालक आणि क्लिनरचाही होरपळून मृत्यू झाला. ट्रक चालक रुस्तम रूदार खान (वय 35, रा. किरवारी, किसनगड, राजस्थान) आणि मदतनीस (क्लिनर) मुस्ताक हनीफ खान (वय 31, रा. मनापुरी, रासगड, राजस्थान) यांचा होरपळून मृत्यू झाला. ताहीर नासीर खान (वय 45, रा. किसनगड, राजस्थान) याच्यावरही भारतीय न्याय संहिता कलम 105, 281, 125 (अ), (ब), 324 (4) आणि मोटार वाहन कायदा कलम 184, 119, 177 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ताहीर नासीर खान गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिस उपनिरीक्षक मधुकर तुुपसौंदर यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 5:25 pm

काँग्रेसने बिहारमधील ऱ्हासातून बोध घ्यावा:काँग्रेसचा BMC स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य की अयोग्य लवकरच कळेल - किशोरी पेडणेकर

काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसला बिहारमधील आपला ऱ्हास पाहूनही मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणे योग्य वाटत असेल तर त्यांना कुणीही थांबवू शकत नाही. त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य हे पुढील काही दिवसांतच ठरेल, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसच्या या निर्णयावर टीका केली. त्या म्हणाल्या, बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला ऱ्हास पाहून त्यांच्या नेत्यांनी बोध घ्यायला हवा. हा ऱ्हास पाहूनही त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर लढवावी. त्यांना कुणीही थांबवू शकत नाही. पण त्यांचे वरिष्ठ निश्चितपणे थांबवू शकतील. जे लोक स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत आहेत, त्यांना ते कदाचित योग्य वाटत असेल. पण पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांच्या वरिष्ठांनाही हा निर्णय योग्य वाटतो का मोठा प्रश्न आहे. त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य हे पुढील काही दिवसांतच कळेल. काय म्हणाले होते रमेश चेन्नीथला? काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय हा पूर्णतः स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार घेण्यात आल्याचे म्हटले होते. काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढेल. आम्ही सर्व 227 जागा लढवू. आमची जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी व सर्व पदाधिकाऱ्यांची ही निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा होती. त्यांच्या इच्छेचा मान राखत आम्ही हा निर्णय घेतला. ही काही लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक नाही. ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते जे म्हणतील तेच होईल. भविष्यात काँग्रेसला मजबूत बनवणे हे आमचे काम आहे. काँग्रेस मजबूत व्हावी अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या भावनांचा मान राखत हा निर्णय घेतला आहे, असे चेन्नीथला म्हणाले. वर्षा गायकवाड यांनी साधला होता मनसेवर निशाणा दुसरीकडे, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणी ठाकरे गटाच्या मनसेला सोबत घेण्याच्या भूमिकेवर टीकेची झोड उठवली होती. त्या म्हणाल्या होत्या, आम्ही देशाचे संविधान मानणारी मंडळी आहोत. सर्वांना सोबत घेऊन जाणारे लोक आहोत. आम्ही सातत्याने मुंबईच्या विकासावर बोलतो. या प्रकरणी सर्वांनी एकत्र येऊन बोलण्याची गरज होती. पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने मारहाण केली जाते किंवा कायदा सुव्यवस्था हातात घेतली जाते. विशेषतः त्यांच्याकडून जी भाषा वापरली जाते, ती भाषा आमच्या सुसंस्कृतपणाला शोभणारी भाषा नाही. काही पक्षांची भूमिका ही मारहाणीची राहिली आहे. लोकांना त्रास देण्याची राहिली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी त्यांचा योग्य तो निर्णय घ्यावा. पण सध्या ते ज्या लोकांशी चर्चा करत आहेत, त्यांच्याशी आमचे कितपत जमेल हे आम्हाला माहिती नाही. एखाद्या छोट्या टपरीवाल्याला किंवा एखादा दुकानदाराला अथवा एखाद्या समोसेवाल्याला मारहाण करणे ही संस्कृती काँग्रेसमध्ये केव्हाही खपली जाणार नाही. गरिबांवर आपली ताकद दाखवणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे शिवसेनेने (ठाकरे गट) त्यांना कुणासोबत जायचे त्याचा निर्णय घ्यावा. पण काँग्रेस पक्ष म्हणून आमचे म्हणणे आहे की, मुंबईत आलेली सर्व मंडळी ही मुंबईकर आहेत. सर्वांनी मुंबईच्या विकासात हातभार लावला आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 5:19 pm

करमाळ्यात शिंदे गटाला मोठा धक्का!:55 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, निवडणूक प्रभारींच्या नियुक्तीवरून नाराजी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे सर्व पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असताना, दुसरीकडे मात्र पक्षांमधील अंतर्गत नाराजी नाट्य समोर येत आहे. यातच आता एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. करमाळ्यातील 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. राज्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार जयवंतराव जगताप यांची करमाळा नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि या नियुक्तीनंतर तत्काळ पक्षात मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. नेमका वाद काय? आगामी निवडणुकीच्या तोंडावर पक्षश्रेष्ठींनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली. या नियुक्तीमुळे स्थानिक राजकारणातील महत्त्वपूर्ण असलेले दिग्विजय बागल यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले. या नाराजीतूनच आक्रमक भूमिका घेत बागल गटातील 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे दिले. याशिवाय, या नाराज पदाधिकाऱ्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या गटाने नोंदणी केलेले जवळपास 20 हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार आहेत. हे सर्व वीस हजार सभासद आपले राजीनामे पोस्टाद्वारे पक्षश्रेष्ठींना पाठवणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बागल गटाला डावलत असल्याची भावना यापूर्वी दिग्विजय बागल यांनी शिंदे गटाकडून करमाळा विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पक्षात कार्यरत आहेत. मात्र, जयवंतराव जगताप यांच्या नियुक्तीनंतर आगामी निवडणुकीत बागल गटाला डावलले जात असल्याची भावना समर्थकांमध्ये निर्माण झाली. या नाराजीतूनच बागल गटातील 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आपले सामूहिक राजीनामे दिले. स्थानिक राजकारणावर परिणाम होणार या सामूहिक राजीनाम्यामुळे करमाळ्यातील शिवसेना शिंदे गटाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पक्षांतर्गत कुरघोडी आणि नेत्यांमधील वादामुळे शिंदे गटासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. या घटनेचा थेट परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 4:51 pm

१० हजार वाटल्याने एनडीएचा विजय: शरद पवार यांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये टाकले. त्यामुळे महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले. बिहारमधील एनडीएचा विजय हा त्याचा परिणाम असावा असे शनिवारी बारामतीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले. शरद पवार म्हणाले, बिहार विधानसभेचे मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून मला असा फिडबॅक मिळाला की, ही निवडणूक महिलांनी हातात […] The post १० हजार वाटल्याने एनडीएचा विजय: शरद पवार यांचा दावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 4:21 pm

अजित पवारांच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान

मुंबई : प्रतिनिधी बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ जागांपैकी २०० पेक्षा अधिक जागांवर एनडीएने बाजी मारली. यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार हे जवळपास निश्चित आहे. भाजप तब्बल ८९ जागांवर आघाडी मिळवित अव्वल पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये प्रथमच भाजपला इतके मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्रात महायुतीत असलेल्या अजित पवारांनी बिहार विधानसभा निवडणुकीत स्वबळावर उमेदवार उभे […] The post अजित पवारांच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 4:20 pm

शिवसेना भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विधानाला महत्त्व देत नाही:BMC च्या महापौर पदावर संजय शिरसाट यांचे विधान; महायुतीत वादाची ठिणगी

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला अद्याप अवकाश आहे. पण आत्तापासूनच सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांत मुंबईच्या महापौरपदावरून आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असा दावा केला आहे. त्यानंतर आता सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी आम्ही रवींद्र चव्हाण यांच्या विधानाला कोणतेही महत्त्व देत नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतेच यावेळी मुंबईचा महापौर भाजपचा होणार असल्याचा दावा केला होता. मुंबईत महापालिकेत महायुतीची सत्ता येणार आणि महापौर भाजपचा होणार, असे ते म्हणाले होते. यामुळे भाजपने 2017 मध्ये थोडक्यात हुकलेले महापौरपद यावेळी कोणत्याही स्थितीत मिळवण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेनेच्या लेखी रवींद्र चव्हाण यांच्या विधानाला कोणतेही महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले आहे. नेमके काय म्हणाले संजय शिरसाट? संजय शिरसाट म्हणाले, मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या संदर्भात रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानाला आम्ही फारसे महत्त्व देत नाही. या प्रकरणी अंतिम निर्णय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. विशेषतः या प्रकरणी युती होत नाही तोपर्यंत भाष्य करणे योग्य नाही. वरिष्ठांच्या सूचनेनुसार शक्य तिथे महायुती म्हणूनच निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे युती होत नाही तोपर्यंत आम्ही याला गांभीर्याने घेणार नाही. संजय शिरसाट यांच्या या भूमिकेवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे आहेत. शिवसेना छत्रपती संभाजीनगरमध्येही जोर लावणार दुसरीकडे, सत्ताधारी शिवसेनेने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही चांगलाच जोर लावण्याचा निर्धार केला आहे. या प्रकरणी शुक्रवारी रात्री संजय शिरसाट यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी शिवसेनेच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत भाजपपुढे युतीचा औपचारिक प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. विशेषतः भाजपने शिवसेनेचा प्रस्ताव फेटाळला तर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचा दावा केला जात आहे. याबैठकीला मंत्री संजय शिरसाट यांच्यासह खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव, माजी आमदार किशनचंद तनवाणी, कैलास पाटील, अण्णासाहेब माने पाटील, भाऊसाहेब चिकटगावकर, माजी महापौर विकास जैन, नंदकुमार घोडेले, त्रिंबक तुपे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, शहरप्रमुख विजय वाघचौरे आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. काँग्रेस मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले, काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढेल. आम्ही सर्व 227 जागा लढवू. आमची जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी व सर्व पदाधिकाऱ्यांची ही निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा होती. त्यांच्या इच्छेचा मान राखत आम्ही हा निर्णय घेतला. ही काही लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक नाही. ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते जे म्हणतील तेच होईल. भविष्यात काँग्रेसला मजबूत बनवणे हे आमचे काम आहे. काँग्रेस मजबूत व्हावी अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या भावनांचा मान राखत हा निर्णय घेतला आहे, असे चेन्नीथला म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 4:18 pm

पुण्यातील आंबिल ओढा कॉलनीत भीषण आग

पुणे : आंबिल ओढा कॉलनीतील साने गुरुजी नगर येथे शनिवारी सकाळी भीषण आग लागली. पुणे महानगरपालिकेच्या कर्मचा-यांच्या वसाहतीतील मीटर रूमला ही आग लागल्याची माहिती सध्या दिली जात आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी, या घटनेने वसाहतीतील असुरक्षित आणि जर्जर स्थिती पुन्हा एकदा उघड केली आहे. गेल्या काही वर्षांत अशा तीन आग लागल्यानंतरही महानगरपालिका प्रशासन […] The post पुण्यातील आंबिल ओढा कॉलनीत भीषण आग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 4:17 pm