बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या सर्व उमेदवारांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला. सर्व उमेदवारांना 1,000 हून कमी मते मिळाली, ज्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला. या पराभवानंतर उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना मोठे वक्तव्य केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करु नका असे मी सांगितले होते. परंतू त्यानंतर आमच्याकडे वरीष्ठ पातळीवर प्रफुल्ल पटेल यांनी काही निर्णय घेतले. मी महाराष्ट्रात लक्ष दिल्याने या बद्दल मला काही माहिती नाही, असे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार म्हणाले की, मी पक्षाला बिहार निवडणुकीत उमेदवार उभे करू नका, असे स्पष्ट सांगितले होते. मात्र, त्यानंतर वरिष्ठ पातळीवर प्रफुल्ल पटेल यांनी काही निर्णय घेतले. मी महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केल्यामुळे याबद्दल मला कोणतीही माहिती नाही, असे सांगत त्यांनी या निर्णयाचे खापर थेट प्रफुल्ल पटेल यांच्यावर फोडले. अजित पवार यांच्या स्पष्ट व ताठर भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वातील मतभेद उघड झाले आहेत. अजित पवारांनी 'ना' सांगितल्यावरही प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवार दिले, या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी एक गंभीर आरोप केला होता. रोहित पवार म्हणाले होते की, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही अजितदादांचे महत्त्व आणि राजकीय वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारमधील या अपयशानंतर आणि अजित पवारांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे, खरोखरच पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील निर्णयांमधून अजित पवारांना बाजूला केले जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. पक्षांतर्गत नेतृत्वाच्या संघर्षाची ही नवी झलक आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप, ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या महायुतीचा विजय झाल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीने केला आहे. वंचितने या प्रकरणी काँग्रेसला आपण मोठा भाऊ असल्याच्या भूमिकेतून बाहेर येण्याचाही सल्ला दिला आहे. काँग्रेसने मोठ्या भावाच्या भूमिकेतून बाहेर यावे. आम्ही तुम्हाला भाऊ मानू, तुमच्याशी युतीही करू. पण तुम्ही मोठे राहिला नाहीत, हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे, असे वंचितने म्हटले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप - जदयु आघाडीचा दैदिप्यमान विजय झाला. यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात तिथे एनडीएचे सलग 5 व्यांदा सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधकांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या सूरात आता वंचित बहुजन आघाडीनेही सूर मिळवला आहे. वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप, मतदान यंत्र व निवडणूक आयोग या तिघांच्या महायुतीचा विजय झाल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस - राजदला का फटका बसला? सुजात आंबेडकर म्हणाले, आज बिहार निवडणुकीचा निकाल आला. त्यात भाजप, ईव्हीएम आणि निवडणूक आयोग यांच्या महागठबंधनने विजय मिळवला. या बिहार निवडणुकीत काँग्रेसने एक घोडचूक केली ती म्हणजे, काँग्रेसची बिहारमध्ये ताकद नसतांना, त्यांचे तिथे नेतृत्व नसतांना आरजेडीशी वाद घालून त्यांनी जास्तीच्या जागा घेतल्या आणि त्या जागांवर काँग्रेसला मोठा पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे बिहारमध्ये आरजेडी-काँग्रेसला फटका बसला. प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी यावेळी काँग्रेसपुढे मैत्रीचा हात पुढे करत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या या पक्षाला आपण मोठा भाऊ राहिलो नसल्याची वस्तुस्थिती स्वीकारण्याचा टोलाही हाणला. काँग्रेसने 'बिग ब्रदर'च्या भूमिकेतून बाहेर यावे. आम्ही तुम्हाला 'ब्रदर' मानू, तुमच्याशी युती सुद्धा करू पण, तुम्ही 'बिग' राहिलेले नाहीत, हे काँग्रेसने समजून घ्यावे. जिथे वंचित बहुज आघाडीचा सन्मान ठेवला जाईल, जिथे सन्मानपूर्वक कार्यकर्त्यांना जागा मिळतील. तिथे नक्कीच वंचित बहुजन आघाडी युती करेल. ..तर काँग्रेसचा सुपडा साफ झाला नसता प्रस्थापित नेत्यांना आमचं एक सांगणे आहे की, तुम्ही कधी शहाणे होणार? काँग्रेसच्या स्थानिक लीडरशिपने शहाणपण दाखवत स्थानिक पातळीवर वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हाच शहाणपणा 2019, 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या राज्याच्या नेत्यांनी दाखवला असता, तर त्यांचा सुपडा साफ झाला नसता, असे ते म्हणाले. खालच्या व्हिडिओत पाहा काय म्हणाले सुजात आंबेडकर? 25 नोव्हेंबरला संविधान सन्मान दिन उल्लेखनीय बाब म्हणजे वंचित बहुजन आघाडीने येत्या 25 नोव्हेंबर रोजी संविधानाच्या सन्मानार्थ संविधान सन्मान महासभेचे आयोजन केले आहे. 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे शेवटचे भाषण दिले. या अत्यंत महत्त्वाच्या भाषणात त्यांनी राष्ट्रापेक्षा धर्माला प्राधान्य देण्याचे धोके आणि समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांसह सामाजिक लोकशाहीची आवश्यकता यावर भर दिला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी येत्या 25 तारखेला संविधानाच्या सन्मानार्थ “संविधान सम्मान महासभा” आयोजित करत आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री जे वेगवेगळ्या व्यासपीठावरून मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र, निझामांचे गॅझेट, मराठा आंदोलन, सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ यांच्याविरोधात बोलताना दिसून येत आहे. हेच मंत्री षड्यंत्र करत महामंडळाचे एलवाय देऊ देत नाही त्यांच्याच सूचनेप्रमाणे हे सर्व होत आहे असे मला वाटायला लागले आहे, असे नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. नरेंद्र पाटील म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे मंत्री छगन भुजबळ हे राज्यात वेगवेगळ्या मेळाव्याना जात अण्णासाहेब पाटी महामंडळाचा चुकीचा प्रचार करत होते. महामंडळाने आणि सरकारने 22 आणि 25 हजार कोटीचे कर्ज कधी दिले नाही. केवळ 1300 कोटी रुपयाचा व्याज परतावा महामंडळाकडून देण्यात आला आहे. त्यांना सरकारच्या धोरणाबद्दल बोलायचे असेल तर त्यांनी बोलावे पण एक लक्षात ठेवले पाहिजे की 80 पासून लढत असताना आता फडणवीसांच्या रुपाने चांगला मुख्यमंत्री आम्हाला भेटला आहे. जे मराठा समाजाला न्याय देत आहे, यामुळे भुजबळांचे पोटदुखी आहे असा टोला नरेंद्र पाटील यांनी लगावला आहे. सरकारने सूचना दिल्या का? नरेंद्र पाटील म्हणाले की, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी दोन्ही गोष्टी पद्धतशीर टप्प्या टप्प्यांमध्ये कमजोर किंवा बंद करण्याचा जो कार्यक्रम आखलेला आहे याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नक्कीच असणार. मला महामंडळाची जबाबदारी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी देण्यात आली आहे. एमडी मराठा असूनही त्यांना याबद्दल काही वाटले नाही. आता सरकार हे मुद्दाम करत आहे का असा सवाल जनतेला पडला आहे. सरकारने त्यांना काही सूचना दिल्या आहेत का? करी योजना बंद करायची असा प्रश्न जनतेला पडला आहे. एलवाय बंद का झाले? नरेंद्र पाटील म्हणाले की, कराडमधील मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी 9 ऑक्टोबरपासून महामंडळाच्या लाभार्थ्यांना देण्यात येणारे एलवाय आहे ते बंद करण्यात आले आहेत असे सांगितले. हे खरं म्हणजे अपेक्षित नव्हते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या व्यासपीठावर महाराष्ट्रामध्ये दीड लाख उद्योजक करण्याचे यश या महामंडळाला मिळाले आहे आणि आता हा आकडा 5 लाखांपर्यंत गेला पाहिजे असे मत मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले आहे. कारण न देता एलवाय बंद नरेंद्र पाटील म्हणाले की, महामंडळाच्या माध्यमातून 5 लाख उद्योजक तयार व्हावे असे मुख्यमंत्री बोलत असताना एमडीच्या माध्यमातून 9 ऑक्टोबरपासून एलवाय बंद करण्यात आले आहेत. या साठी मी एमडींना दोन-चार पत्र लिहले आहे. यासाठी सॉफ्टवेअर अपग्रेडेशन त्यांच्यानंतर कारणं काय आहेत तर काहीच सांगितले गेले नाही.
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...
वसमत शहरात बॅनर प्रकरण:आदर्श आचारसंहिता भंग प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
वसमत येथे सभा असल्याचे बॅनर लाऊन आदर्श आचारसंहितेचा भ्ंग केल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या तिघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 14 गुन्हा दाखल झाला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत कळमनुरी नगर पालिकेची निवडणुक प्रक्रिया सुरु असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकिय पक्षांच्या उमेदवारांसोबतच अपक्ष उमेदवारांची धावपळ सुरु आहे. निवडणूक विभागाने रविवारी देखील उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उमेदवारांची मोठी सोय झाली आहे. जिल्ह्यात निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपविभागीय अधिकारी विकास माने, प्रतीक्षा भुते, समाधान घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकाकडून तीनही पालिकांमध्ये कुठेही आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. दरम्यान, वसमत येथील ग्रामीण पोलिस ठाणे व गवळी मारोती मंदिर ते आसेगाव टी पॉईंट रोडवरील दुभाजकावर 22 ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सभेचे बॅनर लावण्यात आल्याचे दिसून आले. यावरून वसमत पालिकेचे कर्मचारी अरविंद शिकारी यांनी वमसत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये शहरात बॅनर लाऊन शहराचे विद्रूपीकरण करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे नमुद केले. यावरून वसमत शहर पोलिसांनी वंचित बहुजन कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुकुंद करवंदे, कामगार आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष शेख रफी सुलेमान, विश्वनाथ बोखारे यांच्या विरुध्द आदर्श आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, जमादार शेख नय्यर पुढील तपास करीत आहेत.
अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाचा कामाचा डोल्हारा मोठा असला तरी कार्यालयीन कामकाजाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने दिवसेंदिवस हा डोल्हारा कोसळत चालला आहे. विदर्भात नव्हे राज्यातील एक नामांकीत रुग्णालय म्हणून गौरव झालेल्या ‘लेडी हार्डिंग’ अर्थात जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयूमधील निविदा प्रक्रियेत घोटाळाप्रकरणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयंत पाटील व प्रशासकीय अधिकारी ए. एन. डांबरे यांना १ ऑगस्ट २०२५ रोजी निलंबित केले. तेव्हापासून वैद्यकीय अधीक्षकपदी कुणाचीही कायमस्वरुपी नियुक्ती झाली नाही. ज्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाली अशा तिघांनी उणेपुरा एक महिना पदभार सांभाळला आणि महिना, दोन महिन्यांची वैद्यकीय रजा टाकून मोकळे झाले. त्यामुळे या पदांवर ‘प्रभारींवर प्रभारी’ अशी चौघांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे रुग्णालयाचे एकुणच प्रशासकीय कामकाज, व्यवस्थापन आणि रुग्णसेवेचा बोजवारा उडत असल्याचे चित्र आहे. गेल्या ४ महिन्यांपासून या रुग्णालयात प्रभारी अधिकाऱ्यांवर अधिकाऱ्यांची एवढ्या लवकर होत आहे की, रुग्ण आणि कर्मचारी दोघेही गोंधळात पडले आहेत. कोणी प्रभारी अधीक्षक येतो, आठ दिवस राहतो आणि लागलीच दीर्घ वैद्यकीय रजा टाकून निघून जातो, अशी स्थिती निर्माण झाली असून, या सततच्या बदल्यांमुळे रुग्णसेवा आणि प्रशासन यांचा कारभार डामडौल झाला आहे. . वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांनाही नेमक्या कुणाच्या आदेशाचे पालन करायचे हा प्रश्न पडला आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना, नवजात बालकांना आणि त्यांच्या नातेवाइकांना या गोंधळाचा अनपेक्षित फटका बसत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयूमधील निविदा प्रक्रियेत घोटाळाप्रकरणी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी ए. एन. डांबरे, तर रुग्णालयातील भंगार विक्रीप्रकरणी भांडारपाल प्रमोद ढेंगे तीन महिन्यांपूर्वी निलंबित झाले. मात्र ही दोन्ही रुग्णालयाच्या आैषधी व इतर साहित्य खरेदी विक्रीशी व्यवहार करणारे अधिकारी असल्याने त्यांच्या जागी अजून कुणाची कायमस्वरुपी नियुक्ती झालेली नाही. प्रशासकीय अधिकारी पदाचा प्रभार डॉ.वाडेकर यांच्याकडेच दिला. वैद्यकीय अधीक्षक आणि प्रशासकीय अधिकारी दोन्हींचा पदभार त्यांना दिला. भांडारपालचा प्रभार एका कर्मचाऱ्याकडे तात्पुरता दिला. त्यामुळे एकूणच जिल्हा रुग्णालयात ‘प्रभारी राज’ सुरु असल्याने कोणताही ठोस िनर्णय घेण्यास किंवा महत्वाच्या फाईलवर सही करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. पदे भरण्याासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला ^अकोला जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी व भांडारपाल ही पदे कायमस्वरुपी भरण्याासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सध्या तिन्ही पदांवर प्रभारी अधिकारी आहेत. - डॉ. वाकचोरे, आरोग्य उपसंचालक, अकोला परिमंडळ. प्रशासकीय अधिकारी, भांडारपालही प्रभारी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज जिल्हा आरोग्य विभागाकडून या बदल्यांमागील कारणांबाबत कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, सततच्या प्रभारी बदल्यांमुळे प्रशासनातील समन्वय कोलमडला असून, कर्मचारीवर्गामध्ये नाराजी पसरली आहे. आरोग्यसेवा ही सातत्याने आणि जबाबदारीने देणे अपेक्षित असते, पण अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात स्थैर्यच नसल्याने ‘प्रभारी' हा शब्दच कायमस्वरूपी ठरल्यासारखा वाटतो.
‘जिल्ह्यात नायब तहसीलदार यांच्या आदेशाने नोंदवण्यात आलेल्या ३,०४५ जन्म प्रमाणपत्रांचे आदेश रद्द करण्यात आले होते. रद्द झाल्यानंतर ही प्रमाणपत्रे परत मागवण्यात आली होती. यापैकी २,७४१ प्रमाणपत्रे नागरिकांनी जमा केली आहेत. मात्र उर्वरित ३०४ जणांनी नोटीस बजावूनही प्रमाणपत्रे परत केली नाहीत, अशा नागरिकांवर येत्या ४८ तासांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी येथे दिली. शहरातील बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणाची माहिती घेण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या शुक्रवारी अकोल्यात आले होते. जिल्हाधिकारी वर्षा मीना, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने आणि पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांची भेट घेऊन प्रकरणाचा त्यांनी आढावा घेतला. या प्रकरणात प्रशासनाने सोमय्या यांना महत्त्वाची माहिती दिली असून अनेक गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. ही प्रमाणपत्रे अतिरेकी वापरतात की बांग्लादेशी याचा शोध लावण्याचे काम सध्या पोलिस यंत्रणा करत आहे. संबंधित व्यक्ती, त्यांचे पत्ते किंवा त्यांच्याकडील नोंदी यांचा कसलाच ठावठिकाणा नसल्याने ही प्रमाणपत्रे संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. प्रशासन या २०० प्रमाणपत्रांचा शोध घेण्यासाठी तपास पथक नेमणार असल्याचीही माहिती आहे.
कर्मापेक्षा उपासना श्रेष्ठ असून उपासना पेक्षा भक्ती ही श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे भक्ती पेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. सर्व देवता व सृष्टी तलावरील प्राणी मात्राच्या कल्याणासाठी अवतरीत देवी जगदंबेची महती ही या युगात सर्वोच्च व पावन असून केवळ मनुष्यच नसून अगदी भगवान कृष्णाने पण देवीची उपासना केली आहे. मनुष्य प्राणीमात्रात एकही असे कुळ नाही ज्यात कुलदेवी नाही. अगदी एका परधर्मीय लेखकानेही आपल्या पुस्तकात आपल्या समाजात पूर्वी देवीची उपासना केल्या जात असल्याचे सांगितले आहे. भगवान कृष्णाचा जन्म साक्षात विंध्यवासिनीच्या कृपेने झाला असून अशा या पावन जगदंबेचे गुणगाण व अवतार कार्याचे श्रवण व सत्संग ही शाश्वत सुखाची साक्षात प्राप्ती असल्याचा हितोपदेश देवी भागवत कथाकार पुणे येथील पू. मकरंद बुवा सुमंत रामदासी यांनी केला. ते देवी भागवत कथा आयोजन समितीच्यावतीने मुंगीलाल बाजोरीया प्रांगणात आयोजित कथेत मार्गदर्शन करीत होते. योगाभ्यानंद श्री माधवनाथ महाराज यांच्या कृपेने व आपल्या जीवनात सातशे कोटींचा सप्तशतीचा पाठ करणारे स्व. डॉ.टी.व्ही. कुलकर्णी यांच्या स्मृतीत गुरुवारी सुरु झालेल्या देवी भागवत कथेत पू. मकरंद बुवा यांनी कथेचे प्रथम पुष्प गुंफले. या कथेत पू. मकरंद बुवा यांनी देवी भागवतची महिमा विशद केली. ते म्हणाले देवी भागवतची रचना ही सकल जगत कल्याणासाठी करण्यात आली आहे. कर्मापेक्षा उपासना श्रेष्ठ असून उपासना पेक्षा भक्ती ही श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे भक्ती पेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. अशा ज्ञानचक्षुसाठी सद्गुरूची जीवनात आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वप्रथम कथा प्रारंभी कथा यजमान आर्कि संजय महाशब्दे, मंजुषा महाशब्दे, नाथ संस्थान इंदोरचे विश्वस्त संजय नामजोशी, डॉ. हरी शंकर महाशब्दे, सुरेश महाशब्दे आदींनी दीप प्रज्वलन, पादुका पूजन केले. ग्रंथ पूजन पू. मकरंद बुवा व श्रीराम शास्त्री गदाधर यांनी केले. यावेळी वेदमूर्ती श्री नागेश मूर्तीकर यांचा ही सत्कार करण्यात आला. तसेच साथसंगत करणारे रुपेश खरे, विश्वास जोशी, गणेश मिस्त्री आदींचा सत्कार करण्यात आला. कथेत वेदमूर्ती श्री नागेश मूर्तीकर यांनी संहिता वाचन केले. संचालन व कथा उत्सवाची पूर्व पीठिका प्रा. महेश मोडक यांनी सादर करीत पूज्य सद्गुरु माधवनाथ महाराज यांच्या अवतार कार्याची व स्व. डॉ. टी. व्ही. कुळकर्णी यांच्या आध्यत्मिक भक्ती सेवेची माहिती दिली. १९ नोव्हेंबर पर्यंत रोज ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत आयोजित या कथा उत्सवाचा सर्व महिला पुरुष भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन देवी भागवत कथा आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पू. मकरंद बुवा रामदासी यांनी सदगुरु महिमा सांगितला. ज्याच्या जीवनात येतात त्यांचे अंतरबाह्य जीवन संपूर्णपणे बदलून व ढवळून जाते, असे त्याची दृष्टीही बदलून जाते. सद्गुरूच्या मार्गदर्शनानेच भगवंताची प्राप्ती होते. सदगुरु हे अंतकरणातला दोषपूर्ण डाग नष्ट करतात. दंभाच्या विरोधातच मुळी सर्व संत असतात. तथापी प्रापंचिक सुखापेक्षा परमार्थ चांगला असल्याचे संत सांगतात. मात्र काहींना वाटते प्रपंच पण नेटका व्हावा, परमार्थ पण नेटका व्हावा. शुद्ध परमार्थात मनुष्य जायला लागला कि त्याला भोगाचे डोहाळे लागतात. मात्र जबाबदारी व भक्तीत रममाण होऊन परमार्थ जो करतो त्याला विषयाचे भोग विषासमान वाटतात. तथापी जगदंबेची ज्याच्या जीवनात कृपा झाली तर परमार्थ व भोगाचे संतुलन होऊन प्रपंच ही नेटका व परमार्थ ही नेटका होऊ शकतो. जगदंबे पासूनच भोगाचे निर्दालन व भक्ताच्या परमार्थाचे रक्षण खऱ्या अर्थाने होऊ शकत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुलींनी शिक्षण घेत स्वतःच्या पायावर उभे रहावे:उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालिकाश्रमात साधला संवाद
मलकापूर स्थित गायत्री बालिकाश्रम तसेच उत्कर्ष शिशुगृह येथे राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख शांताक्का यांनी भेट दिली. मुलींची उत्तम शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले. शालेय शिक्षणा सोबत राष्ट कार्यासाठी मुलींनी प्रचारीका म्हणून देशसेवा करावी. बालगृहातील मुली प्रचारीका निघाल्यास त्या उत्तम प्रकारे देश कार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शांताक्का यांचे स्वागत गायत्री बालिकाश्रमाच्या अध्यक्षा मिरा जोशी तसेच उत्कर्ष शिशुगृहाचे कोषाध्यक्ष मंगेश दिक्षीत यांनी केले. त्यानंतर शांताक्का यांनी बालिकाश्रमाची पाहणी करुन बालिकांसोबत संवाद साधला. बालिकांसोबत चर्चा केल्यानंतर उत्कर्ष शिशुगृहातील नवजात शिशुंची भेट घेतली. त्या भावुक झाल्या गायत्री बालिकाश्रम व उत्कर्ष शिशुगृह दोन्ही संस्था करीत असलेले कार्य हे उल्लेखनीय आहे असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच त्यांच्या सहसंयोगी यांना बालिकाश्रम येथे मुलींच्या आठवडयातुन एकदा शाखा घेण्यास सांगितले. संस्था भेटीच्या वेळी समितीच्या विदर्भ प्रमुख डॉ. राथा पुरी, जिल्हा कार्यवाहीका वैशाली देशपांडे, जिल्हा कार्यवाहिका वैशाली फडणीस, गायत्री बालकाश्रम संचालक गणेश काळकर, विजय कुमार जानी, सुधाकर गिते, सुनिल नंद, उत्कर्ष शिशुगृहाचे हेमंत चौधरी, रोहीत खोवाल. गायत्री बालिकाश्रम तसेच उत्कर्ष शिशुगृहाचे कर्मचारी तसेच बालगृहातील मुली उपस्थिती होत्या.
घरबसल्या रक्तदान सुविधा; व्हॅन द्वारी:डॉ. हेडगेवार रक्तकेंद्राचा उपक्रम, नाेंदणीची प्रक्रिया सुरू
सध्या रक्त केंद्रामध्ये रक्तपिशव्यांचा तुडवटा निर्माण आहे. मात्र थॅलेसिमीया, शरीरात रक्ताची कमतरता, प्रसुतीकरिता दाखल असलेल्या महिला, अपघात यासह विविध आजारांवर उपचारासाठी रक्त केंद्रात रक्त साठ्याची गरज असते. एकीकडे रक्त पिशव्यांची गरज तर दुसरीकडे रक्त पिशव्यांचा तुडवटा ही अडचण दूर व्हावी यासाठी शुक्रवारी १४ नोव्हेंबर ते शुक्रवारी २८ नोव्हेंबर या कालावधीत डॉ. हेडगेवार रक्त केंद्राद्वारे ‘घरबसल्या रक्तदान’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन रक्त केंद्राने केले आहे. नुकत्याच झालेल्या दिवाळीच्या सुट्ट्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका या पृष्ठभूमीवर नियमित होणाऱ्या रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली. त्यामुळे रक्त केंद्रात रक्तसाठा अत्यल्प आहे. तर दुसरीकडे थॅलेसिमीया, शरीरात रक्ताची कमतरता, प्रसुतीकरिता दाखल असलेल्या महिला, अपघात, कर्करोग व इतर आजारांत रक्त पिशवींची गरज असणारे रुग्ण रक्तासाठी रक्त केंद्रात संपर्क करतात. गरजू रुग्णांची अडचण होऊ नये, रक्त केंद्रातील रक्तसाठा रुग्णांना दिलासा मिळेल. सुसज्ज वाहन या उपक्रमात आपले घर, ऑफीस, कॉलनी, अपार्टमेंट आदी ठिकाणी रक्त केंद्राची रक्त संकलन करणारे सुसज्ज वाहन आपणापर्यंत येईल. यासाठी ९४२२८६२४८९, ९४२२८६२४९१ या क्रमांकावर नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. हेडगेवार रक्त केंद्राद्वारे करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षांचे विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीचे तसेच वारंवार बदलले जाणारे वेळापत्रक, परीक्षेसह पुनर्मूल्यांकनाचा निकाल वेळेवर लावला जात नाही, अशा अनेक उणिवांमुळे पाचही जिल्ह्यातील संतप्त १ हजारावर विद्यार्थ्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वातील मोर्चा शुक्रवारी दु. २.१५ वाजता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठावर धडकला. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसंदर्भा त असलेल्या उदासीनतेसह एकूणच गलथान कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश दिसून आला. त्यांच्या हाती विविध मागण्यांचे फलक झळकत होते. त्याचवेळी विद्यापीठाविरोधात घोषणा दिल्या जात होत्या. गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा समाधी मंदिरापासून एबीव्हीपीच्या नेतृत्वातील मोर्चाला दु. १ वाजता सुरुवात झाली. विद्यापीठातील प्रवेश, निकाल, अभ्यासक्रम, पदभरती व छात्रसंघ निवडणुका यासारख्या विविध समस्या सोडवण्यासाठी एबीव्हीपीच्या विदर्भ प्रदेश मंत्री पायल किनाके यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला. विविध मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांना सादर करण्यात आले. विद्यापीठाचे अकॅडमिक कॅलेंडर सर्व बाबींचा सारासार विचार करून तयार करावे, तसेच वर्षभर त्याचे तंतोतंत पालन केले जावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना सोयीस्कर ठरेल, अशा पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवावी. प्रवेशासंदर्भात सर्व सूचना विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर देण्यात यावी. प्रवेश परीक्षा अधिक पारदर्शक व सहज व्हावी, यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर करावा. अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या छात्रसंघ निवडणुका तातडीने घेण्यात याव्या, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश होता. यासोबतच प्रवेश प्रक्रियेत एजंट्स, ब्रोकर आणि तत्सम गैरप्रकारांविरोधात विद्यापीठ प्रशासनाद्वारे कोणतीही कारवाई केली जात नाही. मात्र, यापुढे प्रवेशादरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांविरोधात ठोस कारवाई करण्यात यावी. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे शुल्क ठरवताना निकषांमध्ये पारदर्शकता असावी. मिळालेली माहिती विद्यापीठाने संकेत स्थळावर उपलब्ध करून द्यावी, परीक्षांचे निकाल व पुनर्मूल्यांकनाचे निकाल वेळेवर लागत नाही. पुनर्मूल्यांकन तसेच मूळ तपासणीच्या निकालात तफावत दिसून येते. यासंबंधी दोषींवर कठोर कारवाई करावी. निकाल परीक्षेपासून ४५ दिवसांच्या आत लावावे. प्राध्यापक दोन ते तीन महिने परीक्षेत गुंतलेले असतात. त्यामुळे ते शिकवण्यासाठी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे प्राध्यापकांना परीक्षा केंद्रांवर केवळ १५ दिवसांकरिता नियुक्त करावे. दर १५ दिवसांनी ही जबाबदारी नव्या प्राध्यापकांकडे सोपवावी, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होतील, अशा एकूण ३४ मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. मोर्चाचे सूत्रसंचालन अमरावती महानगर मंत्री रिद्देश देशमुख यांनी केले. या वेळी विभाग संयोजक ऋषभ गोहणे, महानगर सहमंत्री गौरी भारती, अचलपूर जिल्हा संयोजक ओम धोटे, अॅग्रीव्हिजन प्रांत संयोजक चंद्रकांत बोबडे, मलकापूर नगर मंत्री प्रगती वानखेडे, वाशीम नगर मंत्री ऋषिकेश मानवटकर, मोहदा नगर मंत्री अंशित वर्मा यांच्यासह विद्यापीठातील अमरावती शहर व ग्रामीण, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यातून १ हजारावर विद्यार्थी सहभागी झाले होते. अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वात संत गाडगेबाबा विद्यापीठावर विद्यार्थ्यांचा मोर्चा धडकला. छायाचित्र : अक्षय नागापुरे पूरग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी तातडीने परत करावी महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात येणाऱ्या परीक्षांमुळे शैक्षणिक गुणवत्ता ढासळत चालली आहे. त्यामुळे सर्व परीक्षा विद्यापीठ स्तरावर घेण्यात याव्यात, परीक्षेचे प्रवेश पत्र वेळेवर किमान १० दिवस आधी उपलब्ध करून देण्यात यावे, पूरग्रस्त जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा शुल्क माफ केले आहे. ती रक्कम विद्यापीठाने तातडीने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी. महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण झाल्याची खातरजमा विद्यापीठाने करावी. त्याची माहिती संकेतस्थळावर प्रत्येक सत्राच्या शेवटी प्रसिद्ध करावी, मातृभाषेतील अभ्यासक्रम लवकर सुरू करावे, यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश होता. विविध समस्या दूर करण्यासाठी मोर्चा ^विद्यापीठ तसेच विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या दूर करण्याचा विद्यापीठ प्रयत्न करेल, अशी अपेक्षा आहे. शिक्षणाची ढासळलेली गुणवत्ता लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाला छात्र शक्तीची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. छात्र शक्ती एक झाली तर राष्ट्रशक्ती कशी बनवू शकते, हे सिद्ध करायचे आहे. त्यासाठी हा धडक मोर्चा काढण्यात आला. -पायल किनाके, प्रदेश मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
संत गाडगे बाबांनी आयुष्यभर स्वच्छता, सेवा, दयाळूपणा आणि मानवतेचे मूल्य लोकांच्या मनात रुजवले. त्यांच्या याच सेवाभावी परंपरेचा वारसा जपत अमरावती विद्यापीठाने पुन्हा एकदा समाजहिताचा संदेश देणारा उपक्रम राबवला. वलगाव येथील संत गाडगे महाराज वृद्धाश्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या हस्ते वृद्ध महिला-पुरुषांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. गाडगे बाबांच्या दशसूत्री या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या या वस्त्रदानामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस वृद्धाश्रमातील वातावरणात एक प्रकारची उत्सुकता जाणवत होती. अनेक वृद्धांना आपल्यासाठी काही विशेष घडणार आहे, अशी चाहूल लागली होती. कुलगुरू डॉ. बारहाते वृद्धांशी संवाद साधत प्रत्येकाची तब्येत, त्यांच्या गरजा आणि दैनंदिन जीवनाविषयी विचारपूस करत होते. त्यांच्या या स्नेहपूर्ण संवादामुळे वृद्धांच्या डोळ्यांत कौतुक आणि आत्मियतेची चमक दाटून येत होती. या प्रसंगी वृद्धाश्रमाचे संचालक कैलास बोरसे यांनी वृद्धाश्रमातील रहिवाशांची संख्या, सुविधा तसेच चालणाऱ्या विविध सेवाप्रकल्पांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अनेक संस्था वेळोवेळी मदत करतात. पण ज्या संतांच्या नावाने विद्यापीठ कार्यरत आहे, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रत्यय देत कुलगुरूंनी प्रत्यक्ष वृद्धाश्रमात येऊन वस्त्रदान करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले. वृद्धांनीही ब्लँकेट मिळताच मनापासून आनंद व्यक्त केला आणि विद्यापीठाबद्दल कृतज्ञता दर्शवली. कार्यक्रमादरम्यान एका वृद्ध महिलेचे ब्लँकेट हातात घेताच डोळे पाणावले. गाडगे बाबा आम्हाला विसरत नाहीत, असे भावुक शब्द तिच्या तोंडून निघाले. एका वृद्ध पुरुषाने तर, तुम्ही आम्हाला कुटुंबासारखे वागवता, असे म्हणून कुलगुरूंचे आभार मानले. या उपक्रमाला विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, प्रल्हाद खांडेकर, मीडिया सेलचे अनिकेत ठाकरे, राजू तायडे, अर्जून गुंजकर तसेच वृद्धाश्रमातील महिला-पुरुष कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत वस्त्रदान सोहळा भावनिक वातावरणात पार पडला. गाडगे बाबांच्या तत्त्वज्ञानातील ‘सेवा हीच पूजा’ हा संदेश या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला. वृद्धांना दिलेले प्रेम, आत्मियता आणि ऊब हेच खरे तर गाडगे बाबांच्या सेवाभावाला योग्य अभिवादन ठरले. वस्त्रदान सोहळ्यात बोलताना कुलगुरू डॉ. बारहाते म्हणाले, संत गाडगे बाबा हे केवळ एक समाजसुधारक नव्हते तर ते मानवतेच्या शिकवणीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. त्यांच्या नावाने चालणाऱ्या संस्थेचा प्रमुख म्हणून समाजाप्रती जबाबदारी अधिक आहे. आज येथे येऊन गाडगे बाबांच्या दशसूत्रीची आठवण करून देत वृद्धांना वस्त्रदान करणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी पुढे सांगितले की, आयुष्याच्या संध्याकाळी माणसाला सर्वाधिक गरज असते ती मायेच्या स्पर्शाची. वस्त्रदान ही फक्त एक कृती आहे, पण त्यातून व्यक्त होणारी ओल आणि आपुलकी हीच खरी सेवा आहे. अमरावती विद्यापीठ पुढेही समाजधर्म पाळत अशा उपक्रमांत सहभागी राहील. गाडगेबाबा मानवतेच्या शिकवणीचे चालते-बोलते विद्यापीठ
महापालिकेतर्फे २ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धा २०२५ चा निकाल जाहीर झाल्यानंतर शुक्रवार, १४ नोव्हेंबरला महापालिका कॉन्फरन्स हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी भूषवले. स्पर्धेतील छायाचित्रांचे परीक्षण सुप्रसिद्ध परीक्षक मंडळी उदय खोत (बीएफए), विकास केमदेव (एमए) आणि अद्वेत केवले (बीएससी एन्व्हायरमेंट सायन्स) यांनी संयुक्तपणे केले. त्यांच्या परीक्षणानंतर स्पर्धेचा अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमात आयुक्त सौम्या शर्मा यांच्या हस्ते खालील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रथम क्रमांक शंतनू पाटील प्रमाणपत्र व रु. ११ हजार, द्वितीय क्रमांक भूषण अळसपुरे प्रमाणपत्र व रु. ७ हजार रोख, तृतीय क्रमांक संदीप चौधरी प्रमाणपत्र व रु. ५ हजार, प्रोत्साहन पुरस्कार सुशांत पांडे प्रमाणपत्र व रु. ३ हजार, मनीष मुऱ्हेकर प्रमाणपत्र व रु. २ हजार यांना प्रदान करण्यात आले. या स्पर्धेला शहरातील छायाचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, प्रतिभावंत छायाचित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेचा उपक्रम यशस्वी ठरला. कार्यक्रमास मनपाचे अधिकारी, स्पर्धक तसेच नागरिक उपस्थित होते. या समारंभात अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्य लेखापरीक्षक श्यामसुंदर देव, मुख्यलेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
राज्यस्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ:300 खेळाडू सहभागी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित १४ वर्षे वयोगटातील मुले व मुलींची राज्यस्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेला शुक्रवारी सुरुवात झाली. ही स्पर्धा १५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील आठही विभागातील १६ मुले व मुलीचे संघ असे एकूण ३०० मुले व मुली, पंच, सामनाधिकारी, निवड समिती सदस्य, संघ व्यवस्थापक स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेतील मुलांचे सर्व सामने सायन्सकोर मैदान अमरावती व मुलींचे सर्व सामने पोलिस फुटबॉल क्रीडांगण येथे सकाळ व दुपारच्या सत्रात घेण्यात आले. राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन सायन्सकोर क्रीडांगण येथे करण्यात आले. या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी नितीन चव्हाळ, जिल्हा फुटबॉल संघटना अध्यक्ष अरुण जयस्वाल, उपाध्यक्ष रवी कर्वे, फुटबॉल संघटनेचे सचिव सुशील सुर्वे, हरिहर मिश्रा उपस्थित होते. या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तसेच ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू दीपाली आरोळे यांनी खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. जोएल बांगर या राष्ट्रीय खेळाडूने आणलेल्या क्रीडा ज्योतीने मशालचे प्रज्वलन करण्यात आले. जिल्हा नियोजन अधिकारी भाकरे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी जाधव यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप इंगोले यांनी केले, तर आभार सेवानिवृत्त तालुका क्रीडा अधिकारी संजय कथळकर यांनी मानले.
नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी जोरात सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरताना संबंधित उमेदवारांचा तसेच सूचक आणि अनुमोदकांकडे कोणताही कर थकीत नसावा, ही अट असल्यामुळे नगर पंचायत कार्यालयांमध्ये कर भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच इच्छुकांनी स्वतःकडील कर थकबाकी फेडण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून येते. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी मागील तीन ते चार वर्षांची थकबाकीदेखील भरली असल्याने यंदा नगर पंचायतच्या महसूल वसुलीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. उमेदवारी प्रक्रियेत राजकीय पक्षाकडून नामांकन देताना एक सूचक लागतो, तर अपक्ष उमेदवारांना पाच सूचक आवश्यक असतात. निवडणूक नियमांनुसार हे सर्व सूचक व अनुमोदक थकबाकीदार नसावेत. यामुळे अनेक उमेदवारांनी आपल्या सूचकांच्या आणि अनुमोदकांच्या थकबाकीची रक्कम स्वतः भरल्याचे दिसून येते. त्यामुळे उमेदवारांकडून सध्या थकबाकी भरण्याची मोहीम सुरू असल्याचे चित्र आहे. महसूल वसुली वाढल्याने कामाचा ताण वाढू नये, म्हणून संबंधित नगर पंचायतीने कर भरण्याकरिता विशेष व्यवस्था केली आहे. कर भरण्यासाठी स्वतंत्र काउंटर, वाढीव वेळ आणि ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उमेदवार व नागरिक यांची गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमण्यात आले आहेत. १० ते १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्याअगोदर कर निरंक असणे आवश्यक असल्याने नगर पंचायत कार्यालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिक आणि उमेदवारांकडून कर भरण्याची लगबग सुरू झालेली आहे. निवडणुकीच्या या प्रक्रियेमुळे न. पं.च्या महसुलात मोठी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दर्यापूर नगर पालिकेसाठी भाजप-राष्ट्रवादीची युती
नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून स्थानिक पातळीवर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत युतीची घोषणा केली आहे. यामुळे विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शुक्रवारी स्थानिक ढोकणे भवन येथे पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली आहे. भाजप व राष्ट्रवादीच्या युतीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा भाजपकडे राहणार असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले. २५ नगरसेवकांच्या जागा वाटपाबाबत वरिष्ठ स्तरावरील बोलणीनंतर ठरवण्यात येणार आहेत. युतीचा फॉर्म्युला कसा असेल याबाबत स्पष्टता देण्यात आली नसली तरीही ७० - ३० असा फॉर्म्युला राहणार असल्याचे सूत्रांकडून समजते. दर्यापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असून, भाजपही स्वबळावरच निवडणूक लढवेल, असे अगोदर सांगण्यात आले होते. मात्र वरिष्ठांकडून आलेल्या सूचनेनुसार दर्यापुरात भाजप व राकाँ (अजित पवार गटाने) युती करत महायुतीची घोषणा केली आहे. शिवसेना (शिंदे गट) ही या युतीमध्ये सामील होणार का, याबाबत दोन्ही पक्षांनी तूर्तास मौन बाळगले आहे. राष्ट्रवादीचे जुन्या दर्यापुरात बऱ्यापैकी प्राबल्य आहे. याचा फायदा भाजपला होऊ शकतो. पत्रकार परिषदेला भाजपचे बाबाराव बरवट, मदन बायस्कर मेघा भारती, अनिल कुंडलवार, भरत शुक्ला, विजय मेंढे, माणिक मानकर, रोशन कट्यारमल, दीपक पारोदे, तुषार कडू तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील मोपारी, अमोल गहरवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
चळवळीतून वंचितने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवलेत- सुजात आंबेडकर
आरक्षणाचा विषय असो की अन्याय, वंचितने नेहमीच यशस्वी आंदोलन करत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले आहेत. समाजातील सर्वच घटकांच्या पाठीशी सतत उभे राहत वंचितने समस्या मार्गी लागल्या आहेत. नगरपालिका निवडणुकीत सक्षम उमेदवार उभे करत या चळवळीला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी दर्यापुरात सांगितले. वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन युवा आघाडी, दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विजय संकल्प महासभा’ गुरुवारी दर्यापुरात झाली. या सभेला सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी वंचित आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर, नीलेश विश्वकर्मा, राजेंद्र पातडे, विजय चोरपगार, साहेबराव वाकपांजर, संजय चोरपगार, अंकुश वाकपांजर, माधुरी चोरपगार, आम्रपाली आठवले, भीमराव कुऱ्हाडे, शीतल चोरपगार, अशोक दुधांडे, सदानंद नागे, अशोक नवलकर, राहुल मेश्राम उपस्थित होते. या सभेला उपस्थित परिसरातील नागरिकांच्या घोषणांनी मैदान दुमदुमून गेले. सुजात आंबेडकर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून युवकांना ‘परिवर्तनाचा ध्यास घेऊन नव्या भारताच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारा’ असे आवाहन केले. वंचित समाजातील तरुणांनी संघटित होऊन सामाजिक न्याय आणि समानतेसाठी लढा देणे हीच खरी देशसेवा असल्याचा संदेश त्यांनी दिला.
बाल गुन्हेगारीचे अनेक दुष्परिणाम असून बालकांच्या आयुष्यात शिक्षण नसल्याने खूप मोठी हानी होते. परिणामी भारताची अधोगती होण्यास सुरुवात होते. शिक्षणामुळेच माणसाची प्रगती होऊ शकते. विज्ञानाने सिद्ध केले आहे. बालविवाहनंतर नवविवाहित मुलीस मानसिक, शारीरिक वाढ न झाल्यामुळे स्वतःसह पोटामधील अर्भकाला शोषणासह इतर आजार होऊन धोका बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे बालविवाह करू नये, या करता मार्गदर्शनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन निर्भया पथकाचे पोलिस अंमलदार विशाल सावंत यांनी व्यक्त केले. बालविवाह, बाल गुन्हेगारी, मोटारवाहन कायदा, सायबर गुन्हे, पोक्सो कायदा, डायल ११२ सह शिक्षणाचे महत्त्व इत्यादी सर्व विषयावर निर्भया पथक सोलापूर उपविभाग सोलापूर यांच्या वतीने दि. ११ रोजी लोकनेते बाबुराव पाटील विद्यालय, गोटेवाडी येथे घेण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन निर्भया पथकाचे पोलिस अंमलदार विशाल सावंत यांनी केले. हा उपक्रम उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या अधिपत्याखाली, तर महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक अंजना फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले आहे. मार्गदर्शनपर भाषणात पुढे बोलताना सावंत म्हणाले की, मोटार वाहन कायद्याचे विद्यार्थ्यांनी वयाची मर्यादा पूर्ण झाल्यानंतर रितसर परवाना काढल्यानंतरच वाहन चालवावे. मोटार वाहन चालवत असताना आवश्यक कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने कागदपत्र जवळ बाळगावीत. परवाना जवळ बाळगावे. वाहतुकीचे दिशादर्शक फलकांवर दर्शविल्याप्रमाणे वाहन हकावे. मोटरसायकल चालवीत असताना हेल्मेट असणं गरजेचं आहे. तसेच पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांकडे वाहन देण्याअगोदर त्याच्याकडे परवाना आहे, याची शहानिशा करून द्यावे. या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून जर वाहन पाल्याने आपल्या मर्जीने चालवल्यास त्यांच्या पालकास त्या ठिकाणी कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे यावेळी सांगितली. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ सायबर गुन्ह्यांचे प्रमाण आताच्या काळात खूप वाढले आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसह पालकांना या गोष्टीची जाणीव करून देण्याकरिता, मोबाइलवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. कोणत्याही आमिषाला बळी न पडता, गोपनीय पासवर्ड अथवा इतर कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तीस फोनद्वारे देऊ नये. बँकेची प्रत्येक व्यवहार हे स्वतः बँकेत जाऊन शहानिशा करूनच करावे.
करकंब जिल्हा परिषद सोलापूर विद्यार्थी गुणवत्ता चाचणी शोध लोककला नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात पटवर्धन कुरोली केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवते यांनी प्रथम तर बाभुळगाव केंद्रातील रोपळे येथील जिल्हा परिषद शाळेने लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला. या तालुकास्तरीय स्पर्धा मंगळवार (दि. ११) चळे (ता. पंढरपूर) येथे पार पडल्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजाभाऊ खरे यांच्या पत्नी तृप्तीताई खरे, माजी उपसरपंच भास्कराव मोरे, सरपंच ज्ञानेश्वर शिखरे, उपसरपंच दीपक मोरे, आप्पासाहेब कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्र प्रमुख प्रभाकर घाडगे, आरपीआयचे अध्यक्ष विजय वाघमारे, माजी मुख्याध्यापिका कल्पना भुसे, बाबासाहेब दराडे, सज्जन मोरे, नेताजी गायकवाड, चांदणी, पंडीत इत्यादीसह इतर मान्यवर उपस्थित होते. मोठ्या गटात ८ संघांनी तर लहान गटात १८ संघांनी सहभाग घेतला होता. मोठ्या गटात उंबरे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली यांनी द्वितीय तर तपकिरी शेटफळ शाळेतील विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवला. लहान गटात गुरसाळे केंद्रातील अजोती येथील शाळेने द्वितीय तर भंडीगाव प्राथमिक शाळेने तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धांमध्ये कोळी गीते, देवीचा जागर, शेतकरी गीत, आदिवासी गीत, जागरण गोंधळ इत्यादी प्रकारची गीते सादर करण्यात आली. या स्पर्धेत दोन्ही गटात प्रथम क्रमांक चांगले विद्यार्थी घडवावेत ^शैक्षणिक क्षेत्रात ज्या गोष्टींची गरज व अत्यावक्षकता आहे. त्याची पूर्तता केली जाईल. शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून चांगले विद्यार्थी घडवावेत. या स्पर्धेत सहभागी सर्वांना शुभेच्छा. तृप्तीताई खरे, आमदार प्रतिनिधी क्रमांक आलेल्या संघांची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. परीक्षक म्हणून गोरी अंमळनेरकर, अनिता शिंदे, एल. एम. जाधव, सोमनाथ फडतरे, वनिता बंगाळे, स्वानंदी काणे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन संभाजी माने, आप्पासाहेब रायजादे यांनी केले.
येथील नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे. ग्रामपंचायतीनंतर २०२१ मध्ये नगरपरिषद घोषित झाली होती. तेव्हापासून निवडणुका झाल्या नाहीत. शहरात मुलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लागण्याची मागणी होत असून हा प्रश्न निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो. येथील नगरपरिषद २०२१ मध्ये स्थापन झाली असून त्या अगोदर असणाऱ्या ग्रामपंचायतीत १९४० सालापासून मोहिते पाटील घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. ही ग्रामपंचायत ब्रिटिश कालखंडात १९२२ मध्ये स्थापन झालेली असून रामचंद्र व्होरा या ग्रामपंचायतीचे सरपंच होते. सन १९४० ते ४५ दरम्यान सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील तर १९६९ ते ७२ दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील यांनी ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला. शेवटचे सरपंच हे शिवतेजसिंह मोहिते पाटील होते. २०१० चा अपवाद वगळता या ग्रामपंचायतीत अटीतटीची निवडणूक झाली नाही. त्या काळात मोहिते पाटील यांचे स्थानिक राजकीय विरोधक तितकेसे सक्षम नव्हते. तसेच तालुका पातळीवरील विरोधक या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष घालत नव्हते. मात्र २०१० च्या ग्रामपंचायत निवडणुकीत तत्कालीन शिवसेना तालुकाप्रमुख स्व. दत्ता वाघमारे यांनी या निवडणुकीत गत विधानसभा निवडणुकीतही राजकीय विरोधक माजी आमदार राम सातपुते, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, फत्तेसिंह माने पाटील व कुटुंबीय एकत्र असताना शहरातील ४५ टक्के मतदान मोहिते पाटील यांच्या विरोधात गेले होते. या पार्श्वभूमीवर या नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांचे विरोधक आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. शहरातील व्यापारी असो की कामगारांचे मोहिते पाटील यांच्याशी एक नाते जुळलेले आत्तापर्यंत दिसत होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत फार मोठ्या प्रमाणात विरोधात मतदान गेल्याने विरोधकांचा आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात निवासी प्लॉटिंग वाढले आहे. मात्र ते नग परिषदेने ताब्यात घेतले नसल्याने या नवीन भागातील जनतेला मूलभूत सुविधा मिळणे अडचणीचे ठरत आहे. शिवाय या नवीन वसाहतीतील रस्ते ही अद्याप कच्चे असल्याने या लोकांना पावसाळ्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरात दोन दिवसांआड एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील कचरा जमा करणाऱ्या घंटागाड्या लगतच्या उपनगरात जात नसल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील कचरा अकलाई मंदिर परिसरात डेपो केला आहे. त्याची वेळेत विल्हेवाट लावली जात नाही. नवीन घरपट्टी वाढीचाही प्रश्न आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे खोदले असून, सिग्नल व्यवस्था गेली कित्येक वर्षे बंद आहे. विरोधी पॅनल उभे केल्याने ती एकमेव निवडणूक गाजली होती. सन २०२१ मध्ये अकलूज ग्रामस्थांनी ४३ दिवसांचे साखळी उपोषण करत येथे नगरपरिषदेची मागणी लावून धरली होती. अखेर ३ ऑगस्ट २०२१ रोजी ही नगरपरिषद घोषित करण्यात आली. मात्र, तेव्हापासून नगरपरिषदांच्या निवडणुका न झाल्याने प्रशासकीय कारभार होता. आता या नूतन नगरपरिषदेची पहिली निवडणूक लागली आहे. आत्तापर्यंत ग्रामपंचायतीचा ताबा मोहिते पाटील यांच्याकडेच राहिला असला तरी या निवडणुकीत मात्र मोहिते पाटील यांच्या राजकीय विरोधकांनी लक्ष घातले आहे. या पूर्वीच्या दोन निवडणुकीत डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व फत्तेसिंह माने पाटील यांनी संयुक्तिक पॅनल उभारून निवडणूक लावली होती. त्यात त्यांना एक वेळ दोन तर एक वेळ तीन जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यामुळे शहरातील मोहिते पाटील यांच्या विरोधकात वाढ झाली. मोहिते पाटील व भाजपचे माजी आमदार राम सातपुते, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यात आता जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही आता अकलूज नगरपरिषदेत चांगलेच लक्ष घातले आहे. शिवाय नुकतेच पोलिस प्रशासनाने १० जणांना हद्दपार केले.
माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांना हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी निरोप
अक्कलकोटचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांना शुक्रवारी (दि.१४) हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कुमठे या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी १० वाजेपासून तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. सिद्रामप्पा पाटील यांचे गुरुवारी (दि.१३) सायंकाळी अल्पशा आजाराने सोलापुरातील खासगी रुग्णालयात निधन झाले होते. महाराष्ट्रासह कर्नाटकातून हजारो कार्यकर्ते अंत्यविधीला आले होते ते तडफदार नेता, शेतकरी व जनसामान्यांचे आधारवड, अशी भावना व्यक्त करत होते. कुमठे गावाला लोकांचा वेढा पडला होता. सर्वसामान्यांचा कैवारी, शेतकऱ्यांचा आवाज हरपल्याची हळहळ व्यक्त होत होती. यावेळी जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, शिवानंद शिवाचार्य मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य करजगीचे, शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह कर्नाटकचे कृषी व पणनमंत्री शिवानंद पाटील, इंडीचे आमदार यशवंतराव गौडा पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, धर्मराज काडादी, स्वामी समर्थ सूतमिलचे चेअरमन राजशेखर शिवदारे, माजी आमदार शिवशरण पाटील, विश्वनाथ चाकोते, सुरेश हसापुरे, काडादी महादेव, बहिरगोड रामचंद्र, एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे, कुमार करजगी, बाबुराव पाटील, हनुमंत कुलकर्णी, मल्लिकार्जुन काटगावे, डॉ. अशोक हिप्परगी, प्रकाश हिप्परगी, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील विवेकानंद उंबरजे दयानंद उंबरजे माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ कोडते, जिल्हा परिषद माजी सदस्य अण्णाराव बाराचारे आनंद तानवडे नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार, कर्नाटकचे पंचपा कलबुर्गी, माजी सभापती चनगोंडा हवीनाळे, मेहबूब मुल्ला अमर पाटील, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पू परमशेट्टी, अतुल मेळकुंदे, शंकर मेत्रे माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड, सिद्धेश्वर कल्याण शेट्टी माजी उपनगराध्यक्ष महेश हिंदोळे, माजी सभापती आप्पाराव कोरे परमानंद आलगोंडा, माजी नगराध्यक्ष बसलीगप्पा खेडगी अशोक देवकते, वकील बागवान रमेश बाके माजी सभापती केदार उंबरजे कुंभारी चे शिरीष पाटील उदय शंकर पाटील अमर पाटील शंकर म्हेत्रे सिद्धेश्वर कल्याण शेट्टी, यांच्यासह विविध गावचे सरपंच, अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
प्रथम सूर्योदय ते सूर्यास्त भरतनाट्यम, ६६ तास भरतनाट्यम, गिनीज बुकमध्ये नोंद झालेला नृत्य संस्कार, २१०० कलाकार सहभागी, ५७४ नृत्यांगना घेऊन लावणीचा विक्रम, गतवर्षी अन्नपूर्णा बेस कॅम्प येथे भरतनाट्यम करून इंडिया आणि एशिया बुकमध्ये विक्रम करत भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकारात नवनवीन विक्रम प्रस्थापित केलेल्या तपस्यासिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या नृत्यांगनांनी थेट एव्हरेस्ट बेस कॅम्पवरही कला सादर केली. कोल्हापूरची नृत्य चंद्रिका संयोगिता पाटील, शिष्या दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी या चौघींनी थेंगबोचे मॉनेस्ट्री (१३,००० फूट), एव्हरेस्ट बेस कॅम्प (१७,६५० फूट) आणि काला पत्थर (१८,२०० फूट) या ठिकाणी भरतनाट्यम या नृत्यकलेतून सादर करून एव्हरेस्टला मानवंदना दिल्याचे नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील हिने सांगितले. भज गोविंदम कृष्ण वंदना व मंगलम सादर थेंगबोचे येथे गणपती स्तुती, काला पठार येथे शिव श्लोक, एव्हरेस्ट बेस कॅम्प येथे संयोगिता पाटील यांनी ६ मिनिटांचा श्रीराम स्तुती श्लोक सादर केला. नंतर चौघींनी भज गोविंदम ही कृष्ण वंदना व मंगलम् सादर केले. एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प सर करताना वाटेत तापमानामध्ये चढ-उतार आणि गोठवणारी थंडी होती. सलग पाच दिवस बर्फवृष्टी होत होती. अशा वातावरणात त्यांनी नृत्य सादर केले. पहिले सादरीकरण हे १२ हजार ६८७ फुटांवर दुसरे सादरीकरण १७ हजार ६५० फूट उंचीवरती झाले. यानंतरचा प्रवास अजूनच अवघड व शर्थीचा झाला. उणे ८ अंश तापमानामध्ये सर्व मनोबल एकवटून त्यांनी १८ हजार २०० फूट उंचीवर नृत्य सादरीकरण केले. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर नृत्य करण्यामागचा आमचा उद्देश शास्त्रीय नृत्याचे जतन व जगामध्ये सुरू असलेल्या सर्व गोष्टींमध्ये शांतता निर्माण होऊन सर्वांचे मंगल व्हावे कल्याण व्हावे असा होता. हा अनुभव आमच्या सर्वांसाठीच अविस्मरणीय होता असे तपस्यसिद्धीच्या नृत्यांगनांनी सांगितले. यांनी केली माेहीम यशस्वी गिर्यारोहिका खुशी कांबोज, विनोद कांबोज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम तसेच डॉ. शैलेंद्र नवरे, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. प्रदीप पाटील, सई पाटील, डॉ. सुमती कुलकर्णी, डॉ. अनिता कदम, न्यायाधीश (निवृत्त) वंदना तेंडुलकर, अश्वता विधाते आणि उद्योगपती अभय देशपांडे, संग्राम शेवरे, राजेंद्र पाटील यांनी मोहीम यशस्वी केली. त्यांच्या या मोहिमेचे कोल्हापूर आणि परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.
बालपण हे जीवनातील सोनेरी क्षण असतात. जीवनात मागे पाहताना बालपण आठवते. मात्र सध्या बालपणातच विवाह होत असल्याने त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. बालविवाहमुक्त जिल्हा होण्यासाठी १३२७ गावांच्या ग्रामसभेत या विषयावर जागृती करण्यात आली. तसेच बाल अत्याचार मुक्त जिल्हा होण्यासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहणार आहे. बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुलांसह पालकांमध्ये जागृती आवश्यक आहे. मुलांना स्वसंरक्षणाचे धडे दिल्यास ते आपले संरक्षण अधिक चांगल्या पध्दतीने करु शकतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले. स्नेहालय संचलित उडान प्रकल्प, मराठी पत्रकार परिषद, जिल्हा परिषद जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्यास्थळी लहान मुलांसह बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बाल अत्याचार मुक्त अभियानाला सुरुवात प्रारंभ करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी संजय कदम, पोलिस उपाधीक्षक दिलीप टिपरसे, भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक प्रियंका आठरे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूर शेख, प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड, नागोरी मुस्लिम मिसगर जमात स्टचे अध्यक्ष रेहान काझी, उडान प्रकल्पाच्या मानद सचिव ॲड. बागेश्री जरंडीकर, स्नेहालयाचे संचालक हनिफ शेख, चाइल्ड लाइनचे महेश सूर्यवंशी, डॉ. अंशु मुळे व एम्स इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात हनीफ शेख म्हणाले, बालकांवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी व बालकांच्या हक्कांची जपणूक करण्याचे कार्य उडान प्रकल्प करीत आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रियंका आठरे यांनी विश्वास संपादन केलेले जवळच्या व्यक्तींनी बालकांवर अत्याचार केल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. यासाठी मुलांना चांगला व वाईट स्पर्श याची माहिती देणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन रुपेश पासपुल यांनी, तर आभार ॲड. बागेश्री जरंडीकर यांनी मानले. आकाशात फुगे सोडून बालदिन साजरा करण्यात आला. देश की ताकत हम सब बच्चे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. परिसरात तिरंगे ध्वज, रांगोळी व फुग्यांची सजावट करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय...., देश की ताकत हम सब बच्चे..., जोडो जोडो भारत जोडो... च्या घोषणा देत पाहुण्यांच्या हस्ते आकाशात फुगे व पांढरे कबुतरे सोडण्यात आली. तर जिल्हा बाल अत्याचार मुक्त करण्यासाठी योगदान देण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
वीर लहुजी वस्ताद साळवे हे अन्यायाविरुद्ध लढणारे पहिले समाजसुधारक व क्रांतिकारक होते. त्यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळते आणि त्यांच्या नावाने चौकाचे नामकरण होणे ही अभिमानाची बाब असून अहिल्यानगर शहरात नव्याने सातत्याने वेगवेगळे चौक व रस्ते निर्माण होत आहे तर त्या चौकांना रस्त्यांना व महामार्गांना नावे देणे गरजेचे आहे त्यामुळे महात्मा फुले च्या बरोबर वीर लहुजी वस्ताद यांचे मोठे योगदान राहिलेले आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. समाजातील शूरवीर आणि क्रांतीचे प्रतीक असलेल्या वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त जुने अप्पू हत्ती चौक या चौकाला वीर लहुजी वस्ताद साळवे चौक असे नामकरण करण्यात आले. या नामकरण फलकाचे अनावरण आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अंकुश मोहिते, सुरेश बनसोडे, धनंजय जाधव, सुनील उमाप, अशोक गायकवाड, विजय पठारे, जय भोसले, चंद्रकांत काळोखे, सिद्धार्थ आढाव, भारत पवार, पप्पू पाटील, राम काते, राम वडागळे, विशाल चांदणे, प्रकाश वाघमारे, अश्विन खुडे आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. आमदार जगताप म्हणाले, अहिल्यानगर शहरात बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात आलेले आहे व लवकरच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व वीर लहुजी वस्ताद साळवे यांचेही पूर्णाकृती पुतळे उभारले जाणार असल्याचे सांगितले.
नवीन पिढीला गणिताकडे आकर्षित करणे आवश्यक- प्रा. सुधीर घोरपडे
भारतीयांमध्ये गणिताचे जीन्स आहेत, परंतु आज पदवी स्तरावर गणित विषय घेणाऱ्यांची संख्या घटत आहे. तरुण पिढीला गणिताकडे आकर्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदा अत्यावश्यक आहेत, असे मत आयआयटी मुंबईचे प्रा. सुधीर घोरपडे यांनी व्यक्त केले. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे आयोजित आंतरराष्ट्रीय गणितीय विश्लेषण व अनुप्रयोग परिषद उत्साहात पार पडली. ही परिषद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व ज्येष्ठ गणितज्ञ प्रा. सर्जेराव निमसे यांच्या ७५व्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. घोरपडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी ॲड. विश्वास आठरे होते. देश-विदेशातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रा. घोरपडे यांनी प्रा. निमसे यांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान आणि गणितावरील तळमळ अधोरेखित केली. अध्यक्षीय भाषणात ॲड. आठरे पाटील यांनी गणिताच्या प्रात्यक्षिकतेवर भर देत नवनवीन संशोधन कल्पनांना प्रोत्साहन देण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमांची माहिती दिली. परिषदेच्या आयोजनाची भूमिका प्रा. एस. बी. गायकवाड व प्रा. एम. एम. शिकारे यांनी स्पष्ट केली. याप्रसंगी सहभागींच्या संशोधन सारांश पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. सूत्रसंचालन दीपाली जगदाळे व आफिया खान यांनी, तर आभार डॉ. एल. के. गीते यांनी केले.
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक- विखे
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे राहील, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. कोल्हार येथील बसस्थानका समोरील पटांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन व कोनशील अनावरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे हे होते. यावेळी कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड सुरेंद्र खर्डे, प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे, ज्येष्ठ नेते पांडुरंग खर्डे, अशोक असावा, ॲड. उदय खर्डे, प्रवरा कारखान्याचे चेअरमन सोपानराव शिरसाट, उद्योजक नितीन कुंकूलोळ, श्रीकांत खर्डे,गोरख खर्डे आदी उपस्थित होते. मंत्री विखे म्हणाले, गेल्या ३० ते ४० वर्षांपासून कोल्हारकरांची छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा, अशी मागणी होती ती आज पूर्णत्वास जाताना मला देखील तुमच्या आनंदात सामील होता आले. केवळ पुतळा उभारून उपयोग नाही, छत्रपतींनी केलेल्या कार्याची ऊर्जा तरुणांना मिळावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांची प्रेरणा घेऊन सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी हे महायुतीचे सरकार कटिबद्ध राहील. प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे यांनी विखे यांच्या पाठीशी ॲड. सुरेंद्र खर्डें सह सर्व कार्यकर्त्यांनी उभे राहावे. ॲड सुरेंद्र खर्डे म्हणाले, आम्ही चांगल्या कामाला सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू. कोल्हार येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या भूमिपूजन प्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे.
डोंगरगण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण शाळा परिसर रंगीत फुग्यांनी सजवण्यात आला होता. आकर्षक फलक लेखन, स्वच्छता आणि सुंदर व्यवस्थेमुळे शाळेचे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. बालदिनानिमित्त मुलांनी सादर केलेल्या निवेदनांमधून देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा, त्यांची राष्ट्राला दिलेली महत्त्वाची शिकवण आणि सामाजिक बांधिलकी यांचे सुंदर दर्शन झाले. उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर चेडे यांनी बालदिनाचे महत्त्व, पंडित नेहरूंचे बालप्रेम आणि त्यांच्या विचारांचा भावार्थ मांडत कार्यक्रमाला सुरुवात करून दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध ऐतिहासिक व समाजसेवी व्यक्तिमत्त्वांच्या वेशभूषाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंडित जवाहरलाल नेहरू झालेला अथर्व चांदणे, सरदार वल्लभभाई पटेल झालेला संग्राम चांदणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर झालेला समर्थ कदम, नेताजी सुभाषचंद्र बोस झालेला चैतन्य चांदणे, पूण्यश्लोक अहिल्याबाई होळकर झालेली अनुष्का हिलगुडे, सावित्रीबाई फुले झालेली रुचिता कदम, पंतप्रधान नरेंद्र मोदी झालेला सम्राट चांदणे तसेच ट्रॅफिक सिग्नल झालेला समर्थ चांदणे यांनी या राष्ट्रीय नेत्यांच्या हुबेहूब वेशभूषा करून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या मनोगत सत्रात अनेक विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कार्याची माहिती सोप्या व प्रभावी शब्दांत सादर केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारताची प्रगती, आधुनिक भारताची उभारणी आणि बालकांप्रती असलेले प्रेम याबद्दल मुलांनी आत्मियतेने भाष्य केले. या प्रसंगी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत बालदिनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत शिक्षणासोबतच संस्कार, स्वच्छता, शिस्त आणि राष्ट्रभावनेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमानंतर शाळेत विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था केली होती. यावेळी मनोरंजक खेळांच्या स्पर्धांतही मुलांनी उत्साहाने भाग घेतला. संगीत खुर्ची, फुगा फुगवणे, धावण्याच्या स्पर्धा अशा खेळांनी बालदिनाचा कार्यक्रम अधिक रंगतदार बनवला.
शिर्डी औद्योगिकी करणाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. कौशल्य प्रशिक्षणाची मोठी संधी निर्माण करण्यात येत आहे. टाटा उद्योग समुहाच्या सहकार्याने महिला बचत गटांनाही स्वंय रोजगाराचे मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याची ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. जळगाव येथे सुमारे १ कोटी १३ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभांरभ तसेच रोकडोबा महिला ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन मंत्री विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मंत्री विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती करती आहे. आर्थिकदृष्ट्या देशाची वाटचाल पाहाता येणारे सर्व उद्योग आणि यातून निर्माण होणारे रोजगार मोठ्य संधी निर्माण करुन देणाऱ्या आहेत. विकास प्रक्रियेचा निर्णय करताना केंद्र आणि राज्य सरकारने महिलांना अधिक प्राधान्य दिले असून, ड्रोणदिदी निर्माण करण्यात प्रोत्साहन दिले आहे. कृषि क्षेत्रामध्ये सर्वाधिक वापर ड्रोण तंत्रज्ञानाचा केला जात असून, या माध्यमातून बचत गटांना रोजगार निर्मितीमध्ये मोठा फायदा होत आहे. आपल्या तालुक्यातील महिला बचत गटांच्या चळवळीचे काम प्रभावीपणे सुरु असून, या महिलांना अधिक पाठबळ दिल्यास बचत गटांच्या माध्यमातून चांगल्या पध्दतीचे उद्योग तयार होवू शकतात. यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेली लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. विरोधकांनी यासाठी आटापिटा केला. आता आरोग्य सुविधांच्या बाबतीत सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम राज्य सरकारने केले असून, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत २४०० आजारांचा समावेश करुन, ५ लाख रुपयांचे सुरक्षा कवच या योजनेतून देवू केले असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले. बंद पडलेली सर्व कामे आम्हीच सुरू करणार जलसंपदा विभागाच्या माध्यमातून गोदावरी कालव्यांची कामे सुरुच आहेत, मात्र ज्या ठिकाणी अडचणी आहेत. त्याभागात चाऱ्यांची कामे पूर्ण करुन, पाण्याची वहन क्षमता अधिक चांगल्या पध्दतीने करण्याचे नियोजन केले आहे. यापूर्वी बंद पडलेला गणेश कारखाना सहकारी तत्त्वानेच चालवून तो शेतकऱ्यांच्या मालकीचा कसा राहील यासाठी यशस्वी प्रयत्न केला. बंद पडलेले निळवंडे कालव्यांचे काम पुर्णत्वास नेवून जिरायती भागाला पाणी आणून दाखवले. त्यामुळे बंद पडलेली सर्व कामे सुरु करण्याचे काम आम्हीच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने शहरातील राजकारण तापले आहे. प्रत्येक पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. यंदा नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. दुसरीकडे भाजप व शिवसेना शिंदे गटात युती झाली आहे. नगराध्यक्षपद भाजपला देण्यात आले असून डॉ. नरेंद्र धुडकू ठाकूर यांची उमेदवारी घोषित झाली आहे. मात्र, नगरसेवक पदाच्या जागा वाटपावर दोन्ही पक्षात अद्याप एकमत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. शिंदे गटाला १३ आणि भाजपला १० जागा देण्याचा प्रस्ताव चर्चेत असला तरी अंतिम निर्णय प्रतीक्षेत आहे. येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी वेगात तयारी सुरू केली आहे. सर्वच पक्षांतर्फे तुल्यबळ उमेदवारांची चाचपणी करण्यास प्राधान्य देण्यात आले. दुसरीकडे इच्छुक उमेदवार सुरक्षित प्रभागांचा शोध घेऊन आतापासूनच मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करता आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट समन्वय साधत असून नगराध्यक्ष व नगरसेवकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येता आहे. सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी कोणाला द्यावी याबाबत घडामोडी घडता आहे. स्थानिक उमेदवार, जातीपातीचे गणित लक्षात घेऊन उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. राष्ट्रवादीची वेगळी चूल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत असून पक्षातर्फे स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी सुरू झाली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक २, ४, ६, ८ मध्ये राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवारांचे मोठे आव्हान असेल. नव्या चेहऱ्यांना संधी एरंडोलमध्ये जुन्या चेहऱ्यांसोबत नवे चेहरेही राजकारणात जोरदारपणे पुढे येत आहे. त्यामुळे युतीची वाटचाल कशी होते, स्वतंत्र उमेदवार किती प्रभाव टाकतात, प्रभाग निहाय समीकरणे काय बदलतात याकडे शहराील मतदारांचे आता लक्ष लागले आहे. अपक्ष लढण्याची तयारी विविध राजकीय पक्षातील काही इच्छुक उमेदवार सुरुवातीपासून कामाला लागले होते. त्यांचे प्रचार दौरे सुरू होते. काहींनी तर राजकीय पक्षाची धुरा फक्त उमेदवारीसाठीच घेतली होती. पण अशा इच्छुक उमेदवारांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते अपक्ष रिंगणात येतील. नवे ४००० मतदार यंदा ठरणार निर्णायक या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ४ हजार मतदार प्रथमच मतदानाचा अधिकार वापरणार आहे. शहरात ३१ हजार ३८५ मतदार असून त्यात १५ हजार ३६५ पुरुष तर १५ हजार ७५० महिला आहे. तसेच २ इतर मतदार आहे. ३८ मतदान केंद्रांत मतदान होणार आहे. युवा मतदार कोणत्या पक्षाकडे झुकणार यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. अनेक ठिकाणी महिला उमेदवारांना संधी देण्याची मागणी होत असून गट-तटामुळे काही उमेदवार शेवटच्या क्षणी बदलण्याची शक्यता आहे.
मोबाईल बँकिंगच्या नावाखाली सायबर गुन्हेगार हे समोरील व्यक्तीची माहिती घेऊन त्यांना जास्त मोबदल्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करतात. त्यामुळे कोणीही अशा गोष्टींना बळी पडू नये. तसेच कोणी जर अशा गुन्ह्याला बळी पडलेच तर त्यांनी तत्काळ विनाविलंब सायबर क्राइमकडे तशी तक्रार करावी. जेणेकरून लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडण्यात येऊन आर्थिक नुकसान होण्यापासून वाचता येईल. त्यामुळे सायबर गुन्हे टाळण्यासाठी सावधानता व जागरुकता बाळगण्याचे आवाहन चांदवड तालुका विधिसेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश एस. एस. छल्लाणी यांनी केले. चांदवड तालुका विधिसेवा समिती व चांदवड तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. १३) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात न्या. छल्लाणी यांच्या अध्यक्षतेखाली ‘सायबर क्राइम’ या विषयावर कायदेविषयक प्रबोधन शिबिर पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती व्ही. डी. सुंगारे उपस्थित होत्या. यावेळी न्या. छल्लाणी यांनी विधी सेवा दिनाचे महत्त्व अधोरेखित करताना ९ नोव्हेंबर हा दिवस विधिसेवा म्हणून साजरा करण्यात येतो व ज्या नागरिकांना न्यायालयात मोफत विधिसेवेची गरज असते, त्यांना विधिसेवा प्राधिकरणातर्फे मोफत विधिज्ञ सेवा व मोफत कायदेविषयक सल्ला देण्यात येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच दि. १३ डिसेंबर रोजी चांदवड न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सामोपचाराने व तडजोडीने प्रकरणे मिटविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. चांदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. दिनकर ठाकरे यांनी शिबिराच्या आयोजनामागील उद्देश सांगून तालुका विधिसेवा समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. तालुका विधिसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून अॅड. संग्राम थोरात यांनी सायबर काइम याविषयी माहिती देताना सायबर क्राइमची व्याख्या स्पष्ट केली. सायबर क्राइममध्ये मोबाइल व संगणकाच्या माध्यमातून दूर परदेशातून एखादी व्यक्ती हा गुन्हा करते. सायबर क्राइममध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक बळी पडतात. गुन्हेगार हा मोबाइलवर एखाद्या व्यक्तीला खोटे बोलून बँक ओटीपी मागतो व त्या व्यक्तीची फसवणूक केली जाते. यावेळी त्यांनी सायबर क्राइमचे प्रकार सांगून त्यावर प्रकाश टाकला. फिशिंग म्हणजेच एखाद्या व्यक्तीची माहिती घेऊन त्याला मोबाइलद्वारे कॉल करण्यात येऊन त्या व्यक्तीस फसविण्यात येते. दुसऱ्या प्रकारात लहान मुलांना मोबाइलवर वेगवेगळे गेम खेळताना त्यांना आर्थिक फसवणुकीमध्ये गुंतविण्यात येते असे थोरात म्हणाले.
पिंपळवाडी येथील शेतकरी दिलीप शिंदे यांनी डीपी स्थलांतराच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. शिंदे हे पिंपळवाडीचे माजी सरपंच आहेत. आठ दिवसांपूर्वी त्यांनी काही शेतकऱ्यांसह महावितरण ग्रामीण शाखा क्र. १ चे अधिकारी ईश्वर तावरे यांना भेटून डीपी स्थलांतरासाठी अर्ज दिला होता. मात्र, आठ दिवस उलटूनही कोणतीही कारवाई झाली नाही. शुक्रवारी शिंदे यांनी कार्यालय गाठून अधिकाऱ्याला जाब विचारला. मात्र, उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी संतापून अंगावर पेट्रोल ओतले. हे पाहताच कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडले. हातातील बाटली हिसकावून आत्मदहन थांबवले. यानंतर शिंदे यांनी अधिकाऱ्याला पुन्हा जाब विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी अर्ज वरिष्ठांकडे पाठवला असल्याचे सांगितले.
उर्दू शाळेतून शालेय पोषण आहार चोरी करणारा जेरबंद:अजिंठा पोलिसांची कारवाई; मुद्देमाल केला जप्त
शिवना येथील प्राथमिक उर्दू शाळेतून शालेय पोषण आहारातील तांदूळ, तेल चोरी करणाऱ्यास अजिंठा पोलिसांनी अटक केली. ३ ते ४ नोव्हेंबरदरम्यान शाळेतून हा माल चोरीला गेला होता. मुख्याध्यापक शेख राजिक शेख सादिक यांनी अजिंठा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख अनिस शेख यासिन (रा. यशवंतनगर, सिल्लोड) याला अटक केली. त्याच्याकडून ७५० किलो तांदूळ, ८८ किलो तेल, ८५ किलो मसूर डाळ असा एकूण २६,६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरीसाठी वापरलेली ॲपेरिक्षाही (एमएच २० ईके ३७८४) जप्त करण्यात आली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे, पीएसआय धम्मदीप काकडे, पोहेकॉ भागवत शेळके आदींनी केली.
खंडाळा परिसरात महिनाभरानंतर पुन्हा बिबट्या दिसल्याने शेतकरी आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते २.३० च्या सुमारास गट नंबर ५१५ आणि ५१६ मधील किरण सोनवणे यांच्या शेतात मका काढण्याचे काम सुरू होते. हार्वेस्टर मालक योगराज भाऊसाहेब गवारे स्वतः मका काढत असताना हार्वेस्टरच्या चाकासमोर अचानक बिबट्या दिसला. त्यांनी तत्काळ ब्रेक दाबून हार्वेस्टर थांबवले. बाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सावध राहण्यास सांगितले. ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. बिबट्या पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. शेतकऱ्यांनी फटाके वाजवून त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र तो दाट झुडपात लपून बसला. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
भावाचे निधन झाल्याचे कळताच बहिणीचा मृत्यू:राऊत यांना दीड वर्षांपासून होता पोटाचा विकार
येथील न्यू हायस्कूलमध्ये तब्बल ३८ वर्षे सेवेत राहून विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी जपणारे निवृत्त शिक्षक दत्तात्रय अंबादासराव राऊत (७५) यांचे अल्प आजाराने गुरुवारी (१३ नोव्हेंबर) निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मोठी बहीण प्रयागबाई राधाकृष्ण जाधव (८२, रा. आनंदस्वामी मंदिरामागे, जालना) यांना कळताच त्यांचाही मृत्यू झाला. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. दत्तात्रय राऊत यांनी न्यू हायस्कूल, करमाड येथे सलग ३८ वर्षे सेवा बजावली. विद्यार्थिप्रिय, शिस्तप्रिय आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा परिसरात मोठा सन्मान होता. गेल्या दीड वर्षापासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते. विविध ठिकाणी उपचार करूनही तब्येत सुधारली नाही. गुरुवारी करमाड येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दत्तात्रय राऊत यांच्या निधनाची माहिती एकाच दिवशी भाऊ-बहिणीचे अशा वेदनादायी परिस्थितीत निधन झाल्याने करमाड आणि जालना येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. करमाडला दत्तात्रय राऊत तर जालना येथे प्रयागबाई जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामस्थांत हळहळ
घाटनांद्रा येथे बालदिन उत्साहात साजरा:विद्यार्थ्यांचा केला पुष्पगुच्छ देऊन गौरव
घाटनांद्रा परिसरातील जिल्हा परिषद प्रशाला, इंद्रगढी प्राथमिक शाळा, एकता उर्दू प्राथमिक शाळा, जोगेश्वरी माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नॅशनल मराठी व उर्दू शाळेत बालदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. मुख्याध्यापक भरत सुपेकर, कय्युम शहा, कृष्णा दहेतकर, जितेंद्र गायकवाड, पर्यवेक्षक बी. एस. मेटे, संदीप सपकाळ, पवन मंडळकर आणि शिक्षकांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नेहरू यांचे कार्य आणि बालकदिनाचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनीही नेहरू यांच्या जीवनावर भाष्य करत त्यांचे विचार मांडले. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन गौरविले. जोगेश्वरी माध्यमिक विद्यालयात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा झाली. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटण्यात आले. शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
थंडीची चाहूल लागताच परिसरातील आठवडी बाजारात सुकामेवा खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. सुकामेव्याची मागणी वाढल्याने खोबऱ्याचे भाव चारशे पार गेले आहेत. बदाम ८००, गोडंबी १४०० रुपये किलो या दराने विक्री होत आहे. सिल्लोड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुकामेवा खरेदीस सुरुवात केली आहे. वाढत्या मागणीमुळे सुकामेव्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्राहकांना आखडता हात घेत सुकामेव्याची खरेदी करावी लागत आहे. आठवडी बाजारात नागरिक खोबरा, बदाम, काजू आदी सुकामेव्याची दुकाने थाटत आहेत. थंडी वाढल्याने सुकामेव्याच्या मागणीत वाढ होत आहे. नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, हवामानात गारवा वाढताच पुन्हा ग्राहकांची खरेदीसाठी वर्दळ दिसत आहे. दरम्यान, थंडीच्या दिवसांत सुकामेव्याला नेहमीच मागणी वाढते. यंदा दरवाढ जास्त वाटत असल्याने ग्राहक कमी प्रमाणात खरेदी करत आहेत. भारत-पाकिस्तान, अफगाणिस्तानातील सुकामेव्याच्या तणावामुळे आयातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरवर्षी दिवाळी आणि थंडीच्या दिवसांत सुकामेव्याच्या मागणीत वाढ होते. आठवड्यात थंडी वाढल्यावर खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुकामेव्याचे भाव मागील वर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे गोरगरिबांना पौष्टिक लाडू बनवताना खिशाला महागाईची चांगलीच कात्री बसणार आहे. यावर्षी दुकानांमध्ये सुकामेवा खरेदीसाठी जास्त गर्दी नाही दर वाढीमुळे अनेक ग्राहक आवश्यक तेवढाच सुकामेवा खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याने दुकानात अपेक्षित गर्दी दिसून येत नाही. मात्र, पुढील आठवड्यात खरेदी वाढेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. खोबरा ४००, खारीक २००, बदाम ८००, काजू ९००, मेथी ७० ते ८०, गोंडबी १४०० किलो या भावाने विक्री होत आहे.
फार्मर आयडी मंजुरीसाठी अनधिकृत वसुली:आमदार बंब यांनी घेतली शेतकरी कृती समितीच्या मागणीची दखल
दि. १० नोव्हेंबर रोजी शेतकरी कृती समितीच्या वतीने आण्णासाहेब जाधव, राहुल ढोले, इंजी.महेशभाई गुजर यांनी गंगापूर तहसीलदार यांना जुन्या तहसिल कार्यालयात फार्मर आयडी मंजुरी प्रक्रियेसंदर्भात गंभीर अनियमितता निदर्शनास आली आहे. प्राप्त माहितीनुसार,काही नेमणूक केलेले कर्मचारी अप्रुव्हल पेंडींग असलेल्या शेतकऱ्यांकडून फार्मर आयडी मंजुरीसाठी प्रति शेतकरी १५० रुपये इतके अनधिकृत शुल्क घेत आहेत, असे निवेदन दिले होते. परंतु कारवाई न झाल्याने त्याची प्रत व पुरावे आमदार प्रशांत बंब यांना दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ईमेलद्वारे देण्यात आली. संबंधित बाब अत्यंत गंभीर असल्याने आमदार प्रशांत बंब यांनी लगेच दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता गंगापूर तहसीलदार यांना पत्र दिले. पत्रात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या अतिवृष्टी अनुदानास विलंब झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी मंजूर न झाल्यामुळे त्यांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागले आहे. असे असल्यास सदर कृत्य प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करावी. आमदार प्रशांत बंब यांच्या पत्राची दखल घेत गंगापूर तहसीलदार यांनी फार्मर आयडी अप्रुव्हल करुन घेण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्यांनी गंगापूरला येऊ नये. सर्व प्रलंबित फार्मर आयडी अप्रुव्ह केल्या जातील. ज्यांच्या त्रुटी आढळून येतील त्यांना वेळ देऊन बोलवण्यात येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. असे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयातील दत्तु कर्हाळे यांना कळविले आहे. अशी माहीती त्यांनी फोन वरुन शेतकरी कृती समितीला दिली आहे. पत्रात काय म्हटले आहे? शेतकऱ्यांकडून घेतलेले अनधिकृत शुल्क परत करण्यात यावे, फार्मर आयडी मंजुरी प्रक्रिया पारदर्शक व विनाशुल्क करण्यात यावी, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून त्वरित कार्यवाही करावी.
नाचनवेल येथे रस्त्यावर झाडांची खोडे:वाहतूक ठप्प, अपघात वाढले
नाचनवेल येथे बसस्थानक ते चौफुली या एक किलोमीटर रस्त्यावर फुलंब्री-पाचोरा मार्गाचे काम सुरू आहे. रस्त्यालगत असलेली मोठी झाडे एका ठेकेदाराने घेतली आहेत. सध्या झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. झाडे तोडल्यानंतर त्यांची मोठी खोडे रस्त्यालगत टाकण्यात आली आहेत. या खोडांमुळे वाहनांना ये-जा करताना अडचण येत आहे. वाहतुकीचा खोळंबा असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक ठप्प झाली आहे. संभाजीनगरकडे जाणारा हा जवळचा मार्ग असून येथे रहदारी जास्त आहे. ठेकेदार गेल्या आठ दिवसांपासून ही खोडे उचलण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेली खोडे तातडीने हटवावीत, वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
मध्यवस्तीतील वनविहार काॅलनी व कामगारनगर भागात शुक्रवारी (दि. १४) बिबट्याने पाच तास धुमाकूळ घातला. बिबट्याच्या हल्ल्यात दाेन वनकर्मचाऱ्यांसह ७ जण जखमी झाले. तीन तासांच्या परिश्रमानंतर दाेन वर्षीय बिबट्याला डाॅट मारून ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी १२ वाजता संत कबीरनगर झाेपडपट्टीतील पाटाच्या परिसरात बिबट्याचे दर्शन झाले. दुपारी अडीचला पारिजातनगरच्या जेम्स स्कूल परिसरात शारदा साबळे (३८) यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या हाताला जखम झाली. दुपारी ३ वाजता वनविहार काॅलनीतील प्लाॅट नं. १ मधील शाेभा निकम (६०) यांच्या घरात बिबट्या शिरला. हे पाहताच निकम यांची स्नुषा गितिशा (३२) यांनी त्वरित घराजवळील त्यांच्या दुकानात सासूबाई शाेभा व दाेन लहान मुलांना ओढून दरवाजा बंद केला. बिबट्याने त्यांच्या घरात अर्धा तास मुक्काम केला. दुपारी ३.३० वाजता वनकर्मचारी संताेष बाेडके व पंचवटीतील राहुल देवरे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर ताे गुलमाेहर साेसायटीतील तारामंगल अपार्टमेंटमध्ये आला. तेथे गनद्वारे डाॅट मारल्यानंतर बिबट्याने तेथे लावलेल्या जाळीला भेदून इमारतीच्या पाठीमागे उडी घेतली. तेथे ताे बेशुद्ध स्थितीत पडला. नेमके काय घडले?बिबट्याचा प्रवेश : कामगारनगरात बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.पकडण्यासाठी कसरत : बिबट्या एका घरात लपून बसला होता, पण गोंगाटामुळे तो दुसरीकडे पळाला. बिबट्याला पकडण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी मोठी कसरत केली.कर्मचारी जखमी : बिबट्याला जाळीच्या मदतीने पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्याने वनकर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दाेन कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बघ्यांची गर्दी : बिबट्या पकडण्याचा हा थरार पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. ‘दिसला-दिसला’, ‘पकडा-पकडा’ अशा आवाजांमुळे बिबट्या अधिकच बिथरला होता.यशस्वी जेरबंद : वनविभागाच्या पथकाने बिबट्याला भूल देऊन बेशुद्ध केले. बिबट्याचे निमित्त साधत इच्छुकांनी केली गर्दी वनविहार काॅलनी परिसरात बिबट्या आल्यानंतर प्रभाग क्र. ८ मधील अनेक इच्छुक उमेदवारांनी नागरिकांना दिलासा देण्याच्या बहाण्याने गर्दी केली. यात भाजपचे इच्छुक अधिक हाेते. त्यातच मंत्री महाजनांचे आगमन झाल्याने गर्दी वाढतच गेली. अखेरीस पाेलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवावे लागले. तारामंगल अपार्टमेंटदुपारी १२ वाजता बिबट्याचे संत कबीरनगर परिसरातील पाटाच्या भागात दर्शन झाले. यानंतर सुमारे अडीच तास बिबट्या लपून बसला हाेता. अडीचच्या सुमारास पारिजातनगरला, त्यानंतर वनविहार काॅलनी, कामगारनगर शाळा व शेवटी तारामंगल साेसायटी परिसरात ताे गेला. बिबट्या भरवस्तीत शिरल्याची माहिती मिळताच वनविभागाची रेस्क्यू टीम १० मिनिटांत घटनास्थळी पाेहाेचली. परिसरातील गर्दी पाहून बिबट्या इकडून तिकडे पळू लागला. यावेळी बघ्यांची गर्दी झाल्याने बिबट्या अधिकच बिथरला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ७ जण जखमी झाले. दाेन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले. - कुशार पावरा, वनपरिमंडळ अधिकारी, सातपूर बिबट्याला घरात येताना बघताच धाव घेत दाेन्ही मुलांसह सासूबाईंना दुकानात ओढून घेत दरवाजे बंद केले. अर्ध्या तासानंतर बिबट्या आमच्या घरातून पळाला. त्यानंतर आम्ही शेजारीच राहणाऱ्या नातलगांकडे आसरा घेतला. अजूनही सासूबाईंचा थरकाप उडताे. - गितिशा निकम, प्रत्यक्षदर्शी दुकानापासून काही फुटांच्या अंतरावर बिबट्या बघून अंगाचा थरकाप उडाला. त्वरित दाेन्ही मुलांना दुकानाच्या आत ओढून काचेचा दरवाजा लावला. अजूनही ताे प्रसंग डाेळ्यासमाेर येत आहे. डाॅट मारल्याच्या आवाजानंतर आम्ही दुकानाबाहेर आलाे. - मीनाक्षी पाटील, प्रत्यक्षदर्शी घरात शिरत अर्धा तास मुक्काम, गनने भूल दिल्यानंतर झुडपात पडला बेशुद्ध घराच्या बाहेर उन्हात बसले होती. अचानक बिबट्या दिसला. ओरडल्याने त्याने माझ्या अंगावर झेप घेतली. मी पाठमोरी होते. हाताला बिबट्याचे नख लागले. मात्र सुदैवाने वाचले. - शारदा साबळे, प्रत्यक्षदर्शीबिबट्या पाहण्यासाठी गर्दी गर्दी झाली हाेती. मी आणि मित्र एकनाथ तेथे बिबट्याला पहायला गेलो. गर्दीत उभा असताना अचानक बिबट्याने पाठीवर हल्ला केला. मित्रही जखमी झाला. - बबन शिंदे, रहिवासी, गंगासागर काॅलनी घरात झोपलेलो होताे. अचानक बिबट्याने झडप घातली. प्रतिकार केल्याने त्याने आक्रमक होत माझ्यावर हल्ला केला. मी खाली पडलो. त्याने पाठीला चावा घेतला नशिबाने वाचलो. - किशन लोहार, जखमी
पिसादेवी-पळशी रोडवरील ओंकार सिटी या बांधकाम साइटवरून बेपत्ता झालेली साडेपाच वर्षांची चिमुकली तिच्या घरापासून केवळ ३०० मीटर अंतरावर असलेल्या एका विहिरीत मृतावस्थेत आढळून आली. विशेष म्हणजे, याच विहिरीचा काही दिवसांपूर्वी तपास करण्यात आला होता. सिनू रामा चव्हाण (२३, रा. खापरखेडा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) हा कामगार कुटुंबीयांसह ओंकार सिटी साइटवर कुटुंबीयांसोबत राहतो. त्यांची मुलगी राशी सिनू चव्हाण ११ नोव्हेंबर रोजी परिसरातील मुलांसोबत खेळत असताना बेपत्ता झाली. बराच वेळ न परतल्याने तिच्या आई-वडिलांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मुलीचे वय लक्षात घेता पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नांगरे यांच्या नेतृत्वात तपास मोहीम राबवली. पहिल्याच दिवशी सर्व ओढे, विहिरी आणि खदानी तपासण्यात आल्या होत्या, परंतु राशीचा कोणताही थांगपत्ता लागला नव्हता. सीसीटीव्ही फुटेज किंवा श्वान पथकालाही तिचा माग काढता आला नव्हता. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पळशी रोडवरील पारदेश्वर मंदिराजवळील याच विहिरीत राशीचा मृतदेह तरंगताना आढळला. अग्निशमन विभागाने विहिरीपर्यंत पोहोचण्यासाठी सफाई करून मृतदेह बाहेर काढला. ही विहीर रस्त्यापासून ३० फूट अंतरावर आहे. एका बाजूने उसाची तर दुसऱ्या बाजूने चिकूची शेती आहे. असे असतानाही राशी या ठिकाणी गेली कशी, हा तपास पोलिसांना करायचा आहे. घातपाताच्या दिशेने पोलिसी तपास राशीचा मृतदेह त्याच विहिरीत सापडला, जी विहीर यापूर्वी तपासण्यात आली होती. तसेच, विहिरीपर्यंत जाण्यासाठी अडथळे असतानाही चिमुकली तेथे कशी पोहोचली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. यामुळे राशीचा घातपात झाला असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे आणि या दिशेने ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.
मुंबई महापालिकेसह आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील (भाजप, शिवसेना-शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट) जागावाटपाचे सूत्र गुंतागुंतीचे झाले आहे. मुंबईच्या राजकारणात आता आपली ताकद निर्णायकपणे वाढवण्याची तयारी भाजपने सुरू केली असून पक्षाने १०० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे मित्रपक्षांमध्ये स्पष्टपणे अस्वस्थता पसरली असून यामुळे जागावाटपाचे गणित बिघडण्याची चिन्हे आहेत. मंत्रालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सत्ता समीकरण बदलण्यासाठी भाजपने नियोजनबद्धरीत्या कंबर कसली आहे. भाजप श्रेष्ठींनी १०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून पक्ष आता एकूण जागांपैकी सुमारे १५० हून अधिक जागांवर आपले उमेदवार उभे करण्याच्या पर्यायावर गांभीर्याने विचार करत आहे. भाजपच्या वाढलेल्या आवाक्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून जागांसाठी जोरदार मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिंदे गट) मुंबईत १२५ जागांसाठी आग्रही भूमिका घेतल्याची माहिती आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या या परस्परविरोधी भूमिकेमुळे जागावाटपाचा तिढा वाढत असून अंतिम निर्णय घेताना नेतृत्वाला मोठा राजकीय कस लागणार आहे. मागाठाणे मतदारसंघातील सातही जागा जिंकणार ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मोठे विधान केले आहे. आगामी निवडणुकीसाठी शिंदे गटाची १०० जागांच्या वर लढवण्याची तयारी असून महायुतीतर्फे महापालिकेवर महापौर बसणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुर्वे म्हणाले, “मागाठाणे मतदारसंघातील सातही जागा आम्ही मागणार आणि त्या जिंकणार. सध्या आमच्याकडे १०० नगरसेवक असल्याने आम्हाला १०० जागांची अपेक्षा आहे. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा आमदार प्रवीण दरेकर हे त्यांचा भाऊ प्रकाश दरेकर यांना प्रभाग क्रमांक ५ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. हा प्रभाग या वेळी सर्वसामान्य गटासाठी आरक्षित आहे. २०१७ मध्ये या प्रभागातून संजय घाडी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. काही महिन्यांपूर्वीच घाडी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला. भाजप, शिंदसेनेचा १७८ जागांवर दावा काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले रवी राजा यांचा प्रभाग क्रमांक १७६ या वेळी सर्वसामान्यमधून ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. यामुळे रवी राजा आता प्रभाग क्रमांक १७८ आणि प्रभाग क्रमांक १८१ मधून निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात आहेत, कारण हे प्रभाग सर्वसामान्य गटासाठी आरक्षित आहेत. प्रभाग १७८ मधून २०१७ मध्ये निवडून आलेले शिवसेनेचे (उद्धव गट) नगरसेवक अमेय घोले आता शिंदे गटात आहेत. भाजप नियोजनाचे असे आहेत आकडे विजयाचे लक्ष्य: मुंबईत १०० हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट.उमेदवार संख्या: १५० हून अधिक जागांवर उमेदवार उभे करण्यावर विचार असून त्याची अंमलबजावणी.राजकीय संदेश: मुंबईच्या राजकारणात आता भाजपची भूमिका “मोठा भाऊ’असण्याचे संकेत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला मुंबईतील फुटपाथ विकल्याची घटना समोर आली आहे. हा ३ लाख रुपयांचा व्यवहार २ वर्षांपूर्वी पार पडला. पण आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तो उजेडात आला. यासंबंधीच्या माहितीनुसार, मुलुंड येथे फुटपाथवर पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या संतोष गुप्ता यांना मनपाचा फुटपाथ विकत घेतला आहे. त्यांनी आपण हा फुटपाथ शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी अविनाश बागूल यांच्याकडून विकत घेतल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, अविनाश बागूल यांनी २०२३ मध्ये फुटपाथचा एक भाग आपल्याला ३ लाखांत विकला. ही रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून बागूल यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. ही रक्कम त्यांनी कर्ज व आपल्या आईचे दागिने गहाण ठेवून जमवली. या जागेमुळे आपले नशीब पालटेल अशी त्यांना आशा होती. पण झाले ते भलतेच. संतोष गुप्ता मागील २ वर्षांपासून या व्यवहाराचे दस्तऐवज तयार करण्यासाठी अविनाश बागूल यांच्या मागे लागला होता. पण ते टाळाटाळ करत होते. अखेर कंटाळून गुप्ता यांनी आपले पैसे परत मागितले. पण त्यांना ना ही जागा मिळाली ना दिलेले पैसे मिळाले. त्यानंतर आता त्यांना ज्या जागेसाठी आपण हा व्यवहार केला ती मुंबई महापालिकेची संपत्ती असल्याचे समजले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि हा घोटाळा उजेडात आला. याप्रकरणी अजून तरी शिंदेसेनेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. ३ चेक दिले, पण सर्व बाउन्स झाले संतोष गुप्ता यांनी अविनाश बागूल यांच्याकडे आपल्या पैशांची विचारणा केली, तेव्हा त्यांनी एक जुना चेक दिला. पण तो बाउन्स झाला. त्यानंतर त्यांनी आणखी २ चेक दिले. पण तेही बाउन्स झाले. संतोष गुप्ता यांनी बागूल यांच्यावर एका डोसेवाल्याकडून दरमहा १७ हजार रुपयांची वसुली करण्याचाही आरोप केला आहे. गुप्ता यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर बागूल यांनी त्यांना दीड लाखांचा चेक दिला. पण त्यांनी ज्या बँकेचा चेक दिला त्यात तेवढी रक्कमच शिल्लक नव्हती. त्यामुळे तो चेक वटला नाही. त्यामुळे आता पोलिसांनी गुप्ता यांना कोर्टातून आदेश आणण्यास सांगितले आहे. बागुलांनी फेटाळले गुप्ता यांचे आरोप अविनाश बागूल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. संतोष गुप्ता व माझ्यात कोणताही करार झाला नव्हता. त्याने माझ्याकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. ते मी त्याला परत केले. माझ्यावरील आरोप राजकीय कटाचा भाग आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे यावरून वाद पेटला आहे. फुटपाथवर ठिकठिकाणी अतिक्रमण मुंबई महानगरपालिकेने लागू केलेल्या सुधारित पदपथ धोरणाचा मुख्य उद्देश पादचाऱ्यांसाठी फुटपाथ पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करणे हा आहे. या धोरणांतर्गत, फेरीवाले आणि इतर अडथळे दूर करून, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांना रस्त्यावर न उतरता चालण्यासाठी सुरक्षित व मोकळा मार्ग उपलब्ध केला जातो. पदपथांवरील सुविधा आणि पायाभूत संरचना) सुधारून, हे धोरण मुंबईतील पादचारी वाहतूक सुरक्षित आणि सुलभ बनवण्यावर लक्ष केंद्रित करते. मात्र, मुंबई आणि अनेक उपनगरात फुटपाथवर अतिक्रमणे झाल्याचे दिसून येत असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शिपायांना चक्क संचालक करत 647 कोटींचा जीएसटी घोटाळा:बनावट बिलांच्या रॅकेटचा पर्दाफाश
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाने केलेल्या एका कारवाईत तब्बल ६४७.०५ कोटी जीएसटी फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या फसवणुकीप्रकरणी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. मे. नरवाल केमिकल्स अँड फर्टिलायझर्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका रचना प्रभातकुमार माहेश्वरी आणि मे. अभय ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडचे माजी संचालक विपुल प्रभातकुमार माहेश्वरी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जीएसटी विभागाने बनावट बिले जारी करणाऱ्यांविरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील ही ३८ वी आणि ३९ वी अटक आहे. या आरोपींनी आठ कंपन्यांचे जाळे उभे करून कार्यालयातील शिपाई-चपराशांना कागदोपत्री संचालक बनवले होते. या कंपन्यांमार्फत ३२८.८९ कोटींची बनावट बिले जारी करण्यात आली, तर ३१८.१५ कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) घेण्यात आले. अशा प्रकारे राज्याच्या महसुलाला तब्बल ६४७.०५ कोटी रुपयांचा फटका देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दोघांना मिळाली १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी रचना आणि विपुल माहेश्वरी यांना कोर्टात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राज्य कर सहआयुक्त प्रेरणा देशभ्रतार (IAS) आणि उपायुक्त रमेश शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. राज्य कर विभागाच्या या धडक कारवाईमुळे कोट्यवधींच्या बनावट बिल रॅकेटचे आतापर्यंतचे सर्वात मोठे जाळे उघड झाले आहे.
अनाथ आरक्षण धोरणात रिक्त पदांच्या एक टक्का आरक्षण:संस्थात्मक प्रवर्गाची व्याख्या आता बदलली
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने अनाथांसाठी असलेल्या आरक्षण धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करणारे एक पूरक पत्रक शासन निर्णय जारी केले आहे. या नव्या बदलांमुळे अनाथांना नोकरीत प्राधान्य मिळणार आहे. अनाथ आरक्षण उपलब्ध पदांच्या १ टक्काऐवजी रिक्त पदांच्या १ टक्का यानुसार लागू होणार आहे. यामुळे अनाथांसाठी आरक्षित पदांची संख्या निश्चित करताना अधिक स्पष्टता येणार आहे. अनाथ आरक्षणाची अंमलबजावणी आता दिव्यांग आरक्षणाच्या धर्तीवर असलेल्या “कप्पीकृत समांतर आरक्षण धोरणाऐवजी” “एकूण समांतर आरक्षण” हे तत्त्व स्वीकारून केली जाईल. हे तत्त्व अधिक प्रभावी आणि न्याय्य अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे मानले जाते. पूर्वी “शासन मान्यता प्राप्त संस्था’ असा उल्लेख होता, तो बदलून आता केवळ “महिला व बालविकास विभागाअंतर्गत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ अन्वये कार्यरत बालकांच्या काळजी व संरक्षणाशी संबंधित संस्थामध्ये’ पालन-पोषण झालेल्या अनाथांचाच “संस्थात्मक’ प्रवर्गात समावेश केला जाईल. यामुळे आरक्षणाच्या लाभासाठी पात्र संस्थांची व्याप्ती अधिक निश्चित झाली आहे. तसेच, जिथे जिथे “आई-वडील” असा उल्लेख आहे, तिथे “जैविक आई-वडील” असे वाचण्याचे निर्देश दिले आहेत. संस्थाबाह्य प्रवर्गासाठी पदांचे चक्राकार वाटप जर शासकीय/निमशासकीय पदभरतीमध्ये अनाथ प्रवर्गासाठी फक्त एकच पद उपलब्ध असेल, तर ते पद आळीपाळीने (चक्राकार पद्धतीने) एका भरतीत “संस्थात्मक’ प्रवर्गास आणि पुढील भरतीत “संस्थाबाह्य’ प्रवर्गास उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी सर्व आस्थापनांना अनाथ पदांकरिता स्वतंत्र नोंदवही ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे एकूणच फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील भरतीत नव्याने पद उपलब्ध केले जाईल अनाथ आरक्षणासाठी सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास, ते पद केवळ त्या जाहिरातीपुरते मर्यादित राहील, म्हणजे पुढील भरतीत नव्याने पद उपलब्ध केले जाईल. सरकारच्या या धोरणामुळे राज्यातील हजारो अनाथांना फायदा होणार आहे. या निर्णयाचे राज्यातील अनेक अनाथ संघटनांनी स्वागत केले आहे. तसेच आगामी काळातही अशाच योजना राबव्यात, अशी मागणी केली आहे. प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना प्राधान्य अनाथ प्रवर्गातील निवडलेला उमेदवार रुजू न झाल्यास किंवा राजीनामा दिल्यास, प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवार त्याच सामाजिक प्रवर्गाचा असल्यास त्याला नियुक्ती दिली जाईल. जर प्रतीक्षा यादीतील उमेदवार इतर सामाजिक प्रवर्गाचा असेल आणि त्या प्रवर्गाचे सर्वसाधारण पद रिक्त झाले, तर सामाजिक प्रवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवाराऐवजी अनाथ प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतील उमेदवारास प्राधान्याने नियुक्ती देण्यात येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी १३ उमेदवारांसाठी सभा, रोड शो घेतले. त्यातील १० जण विजयी झाले. त्यांचा स्ट्राइक रेट ७६.९२ टक्के आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभा घेतलेले दोन्ही उमेदवार विजयी झाले. त्यांचा स्ट्राइक रेट १०० टक्के आला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने १४ जागा लढवल्या. त्यातील एकाही उमेदवाराला १००० मते मिळू शकली नाहीत. दरम्यान, बिहारमधील पराभवाला काँग्रेस जबाबदार असल्याची टीका उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी केली. त्यावर विजय वडेट्टीवारांनी त्यांना काहीही बोलू नका, असे फटकारले. राहुल गांधींचा विषारी प्रचार जनतेने नाकारला : देवेंद्र फडणवीस राहुल गांधींचा ‘विषारी प्रचार’ बिहारच्या जनतेने नाकारला. संवैधानिक संस्थांचा अपमान करण्याची किंमत काँग्रेसला चुकवावी लागली. बिहारने महाराष्ट्राप्रमाणेच विकासासाठी एनडीएला प्रचंड बहुमत दिले. बिहारमध्येही लाडक्या बहिणींमुळे मोठे यश मिळाले : एकनाथ शिंदे महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही लाडक्या बहिणींमुळे एनडीएला मोठे यश मिळाले आहे. बिहारी जनतेने जंगलराज नाकारून विकासराज स्वीकारले. या यशात पंतप्रधान मोदी आणि जदयूचे नितीशकुमार यांचा मोठा वाटा आहे. या विजयाने मोदी, अमित शाह, नितीशकुमार यांच्यावरील जनतेचा विश्वास सिद्ध झाला. लाडक्या बहिणींनी महाराष्ट्राप्रमाणे एनडीएला दणदणीत विजय मिळवून दिला, असे अजित पवार यांनी सांगितले.
हर्षदा शिरसाट यांना जि.प. निवडणूक लढणे अशक्य:निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 चीच यादी- प्रशासन
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांनी ४ नोव्हेंबर रोजी गोलवाडीचा पत्ता टाकत मतदार नोंदणीसाठी अर्ज केला. मात्र, निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ रोजी मतदार यादी अंतिम केली आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव आले असले तरी जिल्हा परिषद किंवा ग्रामीण भागातील निवडणूक त्यांना लढणे अशक्य असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. १ जुलै २०२५ च्या यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट झाल्यास ते बेकायदा ठरून त्यांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत, मुदतीनंतर हर्षदा शिरसाट यांनी मतदार यादीत नाव समाविष्ट केल्याचा आरोप केला होता. बीएलओंवर राजकीय दबाव टाकून हर्षदा यांचे नाव यादीत घालण्यात आल्याचे दानवे म्हणाले. यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, माझ्या मुलीचे नाव २ ठिकाणी येऊ नये म्हणून स्थलांतर अर्ज केला आहे. आयोगाकडून प्रक्रिया समजून घेत अर्ज केला असल्याचे ते दिव्य मराठीशी बोलताना म्हणाले.
सुरक्षा विभागाची धावपळ, बॉम्बशोधक पथकही दाखल मुंबई : प्रतिनिधी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. देशभरात सुरक्षा यंत्रणांकडून सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. दिल्लीतील बॉम्बस्फोटाची घटना ताजी असताना मुंबईत आज संशयित बॅग आढळली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या बाहेर एक संशयित बॅग आढळली. त्यामुळे एकच […] The post मुंबईत संशयित बॅग आढळली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रणनितीकार प्रशांत किशोर राजकारण सोडणार?
पाटणा : वृत्तसंस्था बिहार निवडणुकीमध्ये एनडीएने दोनशेच्या वर जागा जिंकल्यानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण एनडीएला अभूतपूर्व यश मिळाले असून, नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेड पक्षाला जवळपास ८५ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत जोरदार तयारी करणा-या प्रशांत किशोर यांच्या पक्षाला मात्र एकही जागा मिळविता आली नाही. निवडणुकीपूर्वी […] The post रणनितीकार प्रशांत किशोर राजकारण सोडणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘त्या’ रुग्णालयात आणखी एका महिलेचा मृत्यू
लातूर : प्रतिनिधी शहरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौकातील ‘त्या’ मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात आणखी एका ३८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला असून संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. येथील बु्-हाणनगरमधील ३८ वर्षीय महिला ‘त्या’ रुग्णालयात गर्भाशयाच्या आजारावर उपचारासाठी गेली होती. उपचारादरम्यान काही तासांतच त्या […] The post ‘त्या’ रुग्णालयात आणखी एका महिलेचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रारुप मतदार यादीला दुस-यांदा मुदतवाढ
लातूर : प्रतिनिधी राज्यातील महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात येणा-या प्रारुप मतदार यादीसाठी राज्य निवडणुक आयोगाने दृस-यांदा मुदतवाढ दिली आहे. दि. १४ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. परंतू, मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या नवीन कार्यक्रमानूसार दि. २० नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्यातील महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एक एक […] The post प्रारुप मतदार यादीला दुस-यांदा मुदतवाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विश्वनाथाच्या रुपाने ‘मानवतेची ज्योत’ प्रज्वलीत
लातूर : प्रतिनिधी जगाला एका सूत्रात ठेवायचे असेल तर मानवता आवश्यक आहे. मानवते शिवाय कोणताही देश जीवंत राहू शकत नाही. देशाच्या उन्नतीसाठी मानवता आणि व्यक्तीचे शुद्ध आचरण अत्यंत महत्वाचे आहे. आज रामेश्वर (रूई) येथे विश्वनाथाच्या रुपाने मानवतेची ज्योत पेटविण्यात आली आहे. जी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आहे.’ असे विचार भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे सुपूत्र व माजी […] The post विश्वनाथाच्या रुपाने ‘मानवतेची ज्योत’ प्रज्वलीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर पंचायत समितीत अभिलेखांची पडताळणी
लातूर : प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण पंचायत राज जिल्हा अभियान २०२४-२५ (मुल्यांकन वर्ष २०२३-२४) अंतर्गत छत्रपती संभाजी नगर विभागातून पंचायत समिती, लातूर प्रथम आल्याने ग्रामविकास विभाग यांचे पत्र दि. ६ ऑक्टोबर २०२५ अन्वये राज्यस्तरीय पडताळणी समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी पंचायत समिती, लातूर येथे अभिलेख्यांची पडताळणी करण्यात आली. सदर पडताळणी समितीने, यशवंतराव चव्हाण पंचायत […] The post लातूर पंचायत समितीत अभिलेखांची पडताळणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महापालिकेच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन
लातूर : प्रतिनिधी प्रभाग क्रमांक ३ मधील नागरी समस्या घेऊन नागरीक महापालिका अधिका-यांच्या दालनामध्ये पोहोचले असता अधिकारी निवेदन स्वीकारायला तयार नाहीत म्हणून महापालिकेच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन चालू केले. आंदोलन करूनही डोळे नाही उघडल्यामुळे झोपून आंदोलन केले. त्यानंतर तब्बल ३ तासानंतर महापालिकेला बँड वाजवुन महापालिका अधिका-यांना जाग करावे लागल्यानंतर त्यांनी महापालिकेचा अधिकारी पाठवून नागरीकांचे निवेदन स्वीकारले. […] The post महापालिकेच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपाचे शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
निलंगा : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे सध्या पक्ष प्रवेशाचे सत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब सूर्यवंशी (हालकी तालुका शिरूर अनंतपाळ) यांनी शुक्रवारी शेकडो कार्यकर्त्यांसह आडीचशे चार चाकी वाहनांचा ताफा काढून भाजपातून काँग्रेसमध्ये निलंगा येथे जाहीर प्रवेश केल्याने भाजपाला मोठे भगदाड पडले आहे. निलंगा शहरातील […] The post भाजपाचे शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह शुक्रवारी संध्याकाळी नोएडा येथे पोहोचले. त्यांनी जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना सेक्टर 19 येथील त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र भूषण 2024 देऊन सन्मानित केले. राम सुतार गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते मुंबईतील पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी वैयक्तिकरित्या भेट देऊन त्यांना हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान केला. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बिहार निवडणुकीच्या निकालांवर आनंद व्यक्त केला. शिल्पकार राम सुतार यांना पद्मभूषण (2018), पद्मश्री (1999) आणि टागोर पुरस्कार (2018) यांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी असंख्य प्रसिद्ध शिल्पे तयार केली आहेत, ज्यात स्टॅच्यू ऑफ युनिटी (सरदार पटेल, 182 मीटर, गुजरात), महात्मा गांधींचा पुतळा (भारतीय संसदेसह 450 शहरांमध्ये) आणि इतर अनेक शिल्पे समाविष्ट आहेत. शिल्पकार राम सुतार हे धुळे, महाराष्ट्राचे आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. यात स्मृतिचिन्ह आणि 25 लाख रोख रक्कम असते. हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निवडला जातो. याआधी हा पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्तींमध्ये लता मंगेशकर (1997), सचिन तेंडुलकर (2001), रतन टाटा (2006) आणि अशोक सराफ (2023) यांचा समावेश आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त कोथरूड येथील गांधी भवन येथे विशेष व्याख्याने आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना प्राध्यापक परिमल माया सुधाकर यांनी, पंडित नेहरू यांच्याशिवाय देशाचा इतिहास अपूर्ण राहील, असे मत व्यक्त केले. प्रा. सुधाकर म्हणाले की, पंडित नेहरूंनी 'ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' या पुस्तकात भारताला वगळून जगाचा इतिहास लिहिता येणार नाही, असे वेळोवेळी सांगितले आहे. कारागृहात खडतर जीवन जगत असताना त्यांनी वाचन आणि लिखाण केले. देशाचा अभिमान बाळगण्यासाठी भूतकाळातील घटनांचा विचार करणे आवश्यक असल्याचे ते मानत होते. त्यामुळे अशोक आणि अकबर यांच्याप्रमाणेच पंडित नेहरू यांच्याशिवाय भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. या कार्यक्रमात पंडित नेहरूंनी तुरुंगवासात असताना लिहिलेल्या 'ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' आणि 'द डिस्कवरी ऑफ इंडिया' या दोन पुस्तकांवर आधारित व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. तसेच, ज्येष्ठ लेखक प्रा. शंकर निकम यांनी लिहिलेल्या 'गैरसमजाच्या विळख्यातील नेहरू' या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. परिमल माया सुधाकर, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, प्रा. शंकर निकम, डॉ. शिवाजी कदम, ॲड. अभय छाजेड, डॉ. एम.एस. जाधव आणि अन्वर राजन उपस्थित होते. प्रा. परिमल माया सुधाकर यांनी 'ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' या ग्रंथाबद्दल अधिक माहिती दिली. नेहरू यांनी हा ग्रंथ १९३१ ते १९३४ या काळात, वयाच्या ४१ ते ४४ व्या वर्षी लिहिला. जगाच्या इतिहासात पाच हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सभ्यता आणि संस्कृतींचे स्थान नगण्य होते, असे त्यांनी नमूद केले. तुरुंगात असताना त्यांनी आपली कन्या इंदिरा हिला जगाची माहिती देण्यासाठी तीन वर्षांत १६० हून अधिक पत्रे लिहिली, ज्याचे प्रारूप म्हणून या ग्रंथाकडे पाहिले जाते. नेहरूंनी भारत आणि परदेशातील भेटींमधील ऐतिहासिक महत्त्वाच्या नोंदी पुस्तकात घेतल्या आहेत. त्यांनी ऐतिहासिक वस्तू ज्या दृष्टिकोनातून पाहिल्या, त्याचा उल्लेखही आढळतो. जगाच्या इतिहासात केवळ भारत आणि चीनमध्ये निरंतर संस्कृती टिकून राहिली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विविध साम्राज्यांचा उदय आणि अस्त तसेच धार्मिक प्रभावांबद्दल त्यांनी केवळ अभ्यासच केला नाही, तर विश्लेषणात्मक लिखाणही केले.
पालिका निवडणुकीतील पहिला गुन्हा:हिंगोलीत मतदारांना 'खिचडी'चे प्रलोभन, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
हिंगोली शहरात पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांना खिचडी वाटप करून प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी तारीख 14 गुन्हा दाखल झाला आहे. पालिका निवडणुकीतील हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे हिंगोली जिल्ह्यांमध्ये हिंगोली सह कळमनुरी व वसमत नगरपालिकाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीमध्ये सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्षांसह अपक्षांची धावपळ सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ तीन दिवस शिल्लक असल्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांकडून शक्ती प्रदर्शनाद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान दुसरीकडे पालिका निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी निवडणूक विभाग व पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने पथकांची स्थापना केली असून या पथकांद्वारे उमेदवारांच्या खर्चांवर लक्ष ठेवले जात आहे. तर पोलिस विभागाने स्थापन केलेल्या पथकाकडून शहरामध्ये येणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान आज शहरातील एका जिनिंग जवळील मोकळ्या मैदानावर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांना खिचडी वाटप करून प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप मोदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय तोडेवाले, अशोक धामणे, शेख मुजीब, गणेश लेकुळे, संतोष करे, गणेश वाबळे यांच्या पथकाने आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पाहणी केली. यावेळी तेथे जमलेल्या लोकांना खिचडी वाटप करून प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून आले. यावरून जमादार तोडेवाले यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी शेख अनवर शेख रहमान याच्यासह एका महिलेविरुद्ध निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांना खिचडी वाटप करून प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न करणे तसेच लोकसेवकाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. जमादार शेख, जमादार संजय मार्के पुढील तपास करीत आहेत
शेयर मार्केटमध्ये ‘बुल्स रन’; आयटीत मात्र विक्रीचा दबाव
मुंबई : वृत्तसंस्था बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात दिवसभर मोठी अस्थिरता दिसून आली. सकाळी गॅप-डाऊन ओपनिंग झाल्यानंतर बाजार जवळपास पूर्ण वेळ लाल निशाणीवर ट्रेड करत होता. मात्र, मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात एनडीए युतीला स्पष्ट बहुमत मिळण्याचे चित्र स्पष्ट होताच, बाजारात अचानक मोठी तेजी आली आणि प्रमुख निर्देशांक हिरव्या निशाणीवर बंद झाले. हा ट्रेंड […] The post शेयर मार्केटमध्ये ‘बुल्स रन’; आयटीत मात्र विक्रीचा दबाव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
७ देशातील ३२ कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेने भारत आणि चीनसह सात देशांमधील ३२ कंपन्या आणि व्यक्तींवर निर्बंध लादण्याची घोषणा केली. इराणच्या क्षेपणास्त्र विकास आणि इतर शस्त्रास्त्रांना रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही कारवाई असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, त्यांनी चीन, इराण, हाँगकाँग, संयुक्त अरब अमिराती, तुर्की आणि भारतासह इतर देशांमध्ये असलेल्या तब्बल ३२ संस्था […] The post ७ देशातील ३२ कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘एआय’ वापरून केली बातमी; पेपरमध्ये प्रॉम्प्ट मात्र ‘जैसे थे’!
इस्लामाबाद : वृत्तसंस्था पाकिस्तानमधील सर्वाधिक खपाच्या ‘डॉन’ या दैनिकाने कार विक्रीवरील एका रिपोर्टमध्ये चक्क ‘एआय’ प्रॉम्प्ट प्रकाशित केला. ‘एआय’चा वापर करून लिहिलेल्या बातमीमधील प्रॉम्प्ट छपाईवेळी तसाच राहिला. प्रकाशित झालेल्या बातमीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तुफान चर्चा रंगली आणि हा वादाचा विषय ठरला आहे. अखेर दिलगिरी व्यक्त करत या चुकीवर पडदा टाकण्यात आला आहे. पाकिस्तानमधील […] The post ‘एआय’ वापरून केली बातमी; पेपरमध्ये प्रॉम्प्ट मात्र ‘जैसे थे’! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शेख हसिना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार? १७ रोजी निकाल; स्फोट, जाळपोळ, कडक बंदोबस्त
ढाका : वृत्तसंस्था सरकारने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्ध गुन्ह्यांच्या आरोपांत फाशीची शिक्षा सुनावण्याची तयारी केली आहे. देशातील ‘आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने’ घोषणा केली की, या प्रकरणाचा अंतिम निकाल १७ नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे. या घोषणेनंतर ढाकामध्ये तणावाचे वातावरण आहे. माजी पंतप्रधानांचा पक्ष असलेल्या आवामी लीगने ‘ढाका बंद’चे आवाहन केले आहे. अल-जझीराच्या वृत्तानुसार, बुधवारी […] The post शेख हसिना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार? १७ रोजी निकाल; स्फोट, जाळपोळ, कडक बंदोबस्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराणींमध्ये संतापाची लाट; खोमेनींकडे फिरवली पाठ
तेहरान : वृत्तसंस्था मध्यपूर्वेतील महत्त्वाचा देश असलेल्या इराणमध्ये जनतेचा असंतोष सध्या शिगेला पोहोचला आहे. राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील सुमारे ९२ टक्के नागरिक सरकारच्या सध्याच्या कारभारावर अत्यंत असंतुष्ट आहेत. हा आकडा आतापर्यंतचा सर्वात मोठा संकेत आहे, ज्यामुळे सरकार आणि जनता यांच्यातील विश्वासाची भिंत वेगाने ढासळत असल्याचे स्पष्ट झाले […] The post इराणींमध्ये संतापाची लाट; खोमेनींकडे फिरवली पाठ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नारी शक्तीने बिहारचा डाव फिरवला!
– ‘जीविका दीदी’, दारूबंदीमुळे महिलांचा एकतर्फी पाठिंबा – यादवांना भाऊबंदकी भोवली; महिला योजना ‘एनडीए’च्या पथ्यावर! पाटणा : वृत्तसंस्था लालू प्रसाद यादवांच्या भावकीतील वाद आणि नितीशकुमार यांच्या महिलांसाठीच्या योजना यामुळे ‘एनडीए’ने घवघवीत यश संपादन केल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये ‘एनडीए’ने जोरदार आघाडी घेतली असून, या अभूतपूर्व यशामागे महिला मतदारांची निर्णायक […] The post नारी शक्तीने बिहारचा डाव फिरवला! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केदार जाधव यांचा विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र:बांधकाम कामगारांच्या गुणवंत मुलांचा बीएआय सत्कार
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरतर्फे बांधकाम कामगारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला. तसेच, सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रेय पवार यांनी कामगारांना कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले. हा कार्यक्रम शनिवार पेठेतील विष्णुकृपा हॉलमध्ये पार पडला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केदार जाधव म्हणाले, की यशस्वी होण्यासाठी जिद्द, परिश्रम, सातत्य, संगत आणि शिस्त अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या जडणघडणीत कुटुंबीय, आसपासचे लोक, शाळा आणि शिक्षकांचा मोठा परिणाम होतो, त्यामुळे संगत उत्तम ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. ज्यांचे सुरुवातीचे संघर्ष तीव्र असतात, ते अधिक सक्षमपणे पुढे जातात आणि मोठी आव्हाने पेलू शकतात, असेही जाधव यांनी नमूद केले. यशस्वी व्यक्ती कसे वागतात, बोलतात, त्यांची देहबोली आणि भाषा कशी असते, याचे विद्यार्थ्यांनी निरीक्षण करून त्यातून शिकले पाहिजे. स्वतःवर आणि स्वतःच्या अनुभवांवर विश्वास ठेवून, जे कराल त्याची जबाबदारी स्वीकारण्याचा सल्लाही त्यांनी दिला. सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रेय पवार यांनी कामगारांच्या पुढच्या पिढ्यांना उत्तम शिक्षण घेऊन करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या या सोहळ्याचे कौतुक केले. ते म्हणाले, राज्याच्या कामगार विभागांतर्गत कल्याणकारी मंडळ कार्यरत आहे. कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांसाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी विविध कल्याणकारी योजना आहेत. कामगारांनी आपल्या नावाची पुराव्यासह नोंदणी कल्याणकारी मंडळात केल्यास, अनेक योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल, असे आवाहन त्यांनी केले. विशेषतः कामगारांच्या पाल्यांसाठी शिक्षणाच्या अनेक योजना असूनही, कामगार नोंदणी करत नसल्याने निधी शिल्लक राहतो, हे चित्र बदलले पाहिजे. कामगारांनी स्वतःची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करून स्मार्ट कार्ड घ्यावे आणि योजनांचा लाभ मिळवावा, असेही पवार यांनी सांगितले. या सत्कार समारंभाला क्रिकेटपटू केदार जाधव, सहायक कामगार आयुक्त दत्तात्रेय पवार, प्रेरक वक्ते समृद्धी जाधव, 'बीएआय'चे अध्यक्ष अजय गुजर, उपाध्यक्ष राजाराम हजारे व महेश मायदेव, कोषाध्यक्ष महेश राठी, बीएआयचे महाराष्ट्र अध्यक्ष जगन्नाथ जाधव, सचिव मनोज देशमुख आणि माजी अध्यक्ष सुनील मते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी नुकतेच सांगितले की, कायद्याची प्रभावी व्यूहरचना, धाडसी नेतृत्व आणि राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर मुंबईतील गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांना यश आले. पुणे येथे 'द ब्रह्मास्त्र अनलीश्ड' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. ध्यास फाउंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी डीजीपी (निवृत्त आयपीएस) डी. शिवानंधन यांनी लिहिलेल्या 'द ब्रह्मास्त्र अनलीश्ड' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. महाराष्ट्राचे माजी डीजीपी (निवृत्त आयपीएस) ए.व्ही. कृष्णन् आणि डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर ध्यास फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष (निवृत्त आयपीएस) डॉ. माधव सानप, प्रसिद्ध लेखक वि.दा. पिंगळे आणि लेखक डी. शिवानंधन उपस्थित होते. डॉ. माशेलकर म्हणाले की, एकेकाळी सर्वसामान्यांचे शहर, काम देणारी मुंबई आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई गुन्हेगारीची राजधानी बनली होती. गुन्हेगारांच्या दहशतीमुळे सधन कुटुंबातील व्यक्तींना लग्नकार्य, वाहन किंवा गृह खरेदीही मनमोकळेपणाने करता येत नव्हती. नव्वदच्या दशकात टोकियो, यासुका, कोलंबिया, न्यूयॉर्कसारख्या जागतिक शहरांमध्येही माफियांचा धुमाकूळ होता. मात्र, धाडसी आणि कणखर नेतृत्वाने कायद्याच्या चौकटीत राहून या गुन्हेगारांना आवरले. आज डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या सहज उपलब्धतेमुळे गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे या नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी पोलिसांना सज्ज राहावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी बोलताना ए.व्ही. कृष्णन् यांनी सांगितले की, मुंबईतील गुन्हेगारी केवळ एन्काऊंटरने संपण्यासारखी नव्हती, तर त्यासाठी कायद्याचा धाक आवश्यक होता. मोक्कासारख्या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे पोलिसांनी मुंबईतील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढली. 'द ब्रह्मास्त्र अनलीश्ड' या पुस्तकाचे लेखक डी. शिवानंधन यांनी ९० च्या दशकातील परिस्थिती स्पष्ट केली. दाऊद इब्राहिम, छोटा शकील, छोटा राजन यांसारख्या गुन्हेगारांनी दहशतवादी हल्ले, खंडणी आणि खुनांच्या सत्राद्वारे मुंबईत दहशत निर्माण केली होती. एके-४७ सारख्या अत्याधुनिक शस्त्रांनी मुंबई अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांनी त्यांना कायद्याच्या चौकटीत आणले. वि.दा. पिंगळे यांनी पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवताना सांगितले की, मुंबईतील गुन्हेगारीमुळे शहराचा विकास खुंटला होता आणि शांतता भंग पावली होती. डी. शिवानंधन यांच्यासारख्या धाडसी आणि करारी पोलीस अधिकाऱ्यांमुळे धास्तावलेल्या मुंबईकरांना मोकळा श्वास घेता आला आणि सुरक्षित वाटू लागले.
वसमत तालुक्यातील जुनूना येथे जमीनीच्या कारणावरून झालेल्या खून प्रकरणात चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश अनुसुचीत जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. धर्मपाल मेश्राम यांनी शुक्रवारी ता. १४ महसूल व पोलिस प्रशासनाला दिले आहेत. वसमत तालुक्यातील जुनूना येथे जमीनीच्या कारणावरून झालेल्या वादानंतर खूनाची घटना घडली होती. त्यानंतर आज अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. धर्मपाल मेश्राम यांनी जूनूना येथे भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, तहसीलदार शारदा दळवी, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. मेश्राम यांनी प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन करून या समितीला तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच खून प्रकरणातील सविस्तर माहिती व घटनाक्रम, तपासाची सध्याची स्थिती याची माहिती सादर करण्याच्या सूुचनाही पोलिस अधिक्षक कोकाटे यांना दिल्या आहेत. सद्यस्थितीत जुनुना गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि गावातील प्रत्येक समाजाचा एक प्रतिनिधी सहभागी करून ग्रामपातळीवरील शांतता समिती तातडीने स्थापन करावी. तसेच या समितीने दर पंधरा दिवसाला आढावा बैठक घेऊन गावातील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली. यासोबतच एकसदस्यीय चौकशी समिती, पोलीस विभागाचा सविस्तर तपास अहवाल आणि ग्रामस्तरीय शांतता समित्यांच्या अहवालासह सर्व तीन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच आयोग अंतिम निर्णय देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी युसीआय (युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल) मानकांनुसार सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सुमारे ५० देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस आणि परिवहन विभागासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आणि पुणे ग्रँड चॅलेंज टूरचे तांत्रिक संचालक पिनाकी बायसक उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षा पासेस, सायकलपटूंची वाहतूक, ट्रॅकवरील सुविधा, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांचे प्रशिक्षण यावर प्रामुख्याने लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शहरी तसेच ग्रामीण भागातील भौगोलिक परिस्थिती, गर्दी आणि परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावरही भर देण्यास सांगितले. पोलीस अधिकारी आणि सायकल संघटनांमध्ये योग्य समन्वय साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत संपूर्ण रस्त्याची लांबी सुरक्षादृष्ट्या तपासणी करावी. या कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण द्यावे आणि त्यानंतर नियोजनात कोणताही बदल करू नये, असे डुडी म्हणाले. विशेषतः ग्रामीण मार्गावर प्राणी येणार नाहीत याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत स्पर्धा होणार असल्याने पोलिसांचे एकच पथक कॉन्व्हॉयसोबत असावे. खेळाडूंच्या आगमनापासून ते प्रयाणापर्यंत ग्रीन कॉरिडोर तयार करावा आणि सुरक्षा पासेस देण्याबाबतही नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, स्पर्धेवेळी मुख्य मार्गावर वाहतूक नियोजन आणि गर्दीचे व्यवस्थापन ही मोठी जबाबदारी आहे. यासाठी परिसरातील नागरिकांची जनजागृती करणे आवश्यक आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असेही पाटील म्हणाले.पुणे ग्रँड चॅलेंज टूरचे तांत्रिक संचालक पिनाकी बायसक यांनी स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या मार्गाची तपासणी, गर्दी व वाहतुकीचे व्यवस्थापन, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती व प्रशिक्षण याबद्दल माहिती दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर या स्पर्धेचे महत्त्व, सहभागी खेळाडूंद्वारे होणारे सुरक्षेचे मूल्यांकन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळताना घ्यावयाची काळजी यावरही त्यांनी प्रकाश टाकला. स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत करण्यात येणाऱ्या सुरक्षात्मक उपाययोजना, पोलीस विभाग आणि सायकल संघटनांमधील समन्वय यावर बायसक यांनी भर दिला. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन हे आपल्या देशाची प्रतिमा उंचावणारे असल्याने संपूर्ण स्पर्धेदरम्यान चोख पोलीस सुरक्षा पुरवण्यासह गर्दी व वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला पाहिजे, असेही बायसक यांनी नमूद केले.
'संघर्षगाथा माझ्या आयुष्याची' आत्मकथनाचे प्रकाशन:सुनील देवधर म्हणाले, देशसेवेसाठी जात-भाषा भेद विसरा
भारतीय जनता पक्षाचे माजी सचिव आणि माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी नुकतेच 'संघर्षगाथा माझ्या आयुष्याची' या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी बोलताना देवधर यांनी देश आणि समाजसेवेसाठी जात, धर्म, प्रांत आणि भाषेच्या पलीकडे जाऊन कार्य करण्याचे आवाहन केले. हे पुस्तक अमितकुमार बॅनर्जी यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित आहे. बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधून येऊन महाराष्ट्रात 'संपर्क' संस्थेच्या माध्यमातून बालग्रामसारखे मोठे उपक्रम राबवले आहेत. महाराष्ट्रातील वंचित आणि अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे देवधर यांनी कौतुक केले. देवधर म्हणाले की, संपर्क संस्थेचे बालग्राम उपक्रमाचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी हे महाराष्ट्राचा अभिमान आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील असंख्य अनाथ मुलांना ममता मिळाली आहे. प्रत्येक व्यक्तीने समाजाकडून मिळालेल्या गोष्टींची सेवाभावातून परतफेड करावी, असे आवाहन त्यांनी केले. सेवाकार्य निरपेक्ष, पवित्र असावे आणि त्यात भ्रष्टाचार नसावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, माजी शिक्षणाधिकारी डॉ. अनिल गुंजाळ, साहित्यिक प्रसाद मिरासदार, अमितकुमार बॅनर्जी, रत्ना बॅनर्जी, उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशी, सुधीर राशिनकर आणि अण्णा कातळे आदी मान्यवर उपस्थित होते. अमितकुमार बॅनर्जी यांनी आपल्या प्रवासाविषयी सांगितले की, सुमारे ३५ वर्षांपूर्वी ७ अनाथ मुलांसह मातीच्या घरातून संस्थेच्या कामाला सुरुवात केली होती. आज देशभरात संस्थेची ११ केंद्रे आहेत. केवळ भावनिक होऊन नव्हे, तर योग्य गणिते सांभाळत हे काम उभे केले. अनेक सहकाऱ्यांच्या मदतीमुळे हे कार्य शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. हे पुस्तक म्हणजे आंदोलन नसून, त्यांच्या कामाचा प्रवास सांगण्याचा प्रयत्न आहे. डॉ. सदानंद मोरे यांनी अमितकुमार बॅनर्जी यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की, त्यांचे काम राष्ट्रीय एकात्मतेचे उत्तम उदाहरण आहे. दुसऱ्या राज्यात येऊन संघर्ष करणे आव्हानात्मक असले तरी, त्यांनी केलेल्या कामाने महाराष्ट्र समृद्ध होईल. हे आत्मकथन अनेकांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील २५ गुणवंत विद्यार्थ्यांची अमेरिकेतील १० दिवसांच्या शैक्षणिक दौऱ्यासाठी निवड झाली आहे. हे विद्यार्थी नासा येथे अभ्यासदौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात या विद्यार्थी चमूला प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू तसेच काही शिक्षक व पालक उपस्थित होते. डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा येथे भेट देण्याची ही एक मोठी आणि अभिमानास्पद संधी आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना अमेरिकेतील शिस्त व शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, अनोळख्या वस्तूंना हात न लावणे, एकमेकांना मदत करणे, एक संघ म्हणून काम करणे, शिक्षकांच्या सूचनांचे पालन करणे आणि तब्येतीची काळजी घेणे यावर त्यांनी भर दिला. या दौऱ्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थी नासा केनेडी स्पेस सेंटर, स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम, नासा अर्थ इन्फॉर्मेशन सेंटर, तसेच सॅन फ्रान्सिस्कोमधील प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांना भेट देणार आहेत. हे शिष्टमंडळ १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे मुंबई येथून प्रस्थान करणार आहे. या दौऱ्यात इयत्ता ६ वी व ७ वी मधील ९ मुली आणि १६ मुलांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत आयुकाचे शास्त्रज्ञ समीर दुर्डे, शिक्षिका माया लंघे (हवेली), प्रमिला जोरी (आंबेगाव), सुनीता खलाटे (बारामती) आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला साळुंके (दौंड) यांचाही समावेश आहे. हा कार्यक्रम 'पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पातील' एक महत्त्वाचा उपक्रम असून, पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी 'आयुका'च्या (IUCAA) सहकार्याने केली जात आहे. या उपक्रमाला ग्रामीण विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता, ज्यात १७,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये काटेकोरपणे पूर्ण करण्यात आली. नासाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयुकाने विशेष तयारी वर्गांचे आयोजन केले होते, ज्यात वैज्ञानिक विषय, आंतरराष्ट्रीय संशोधन पद्धती आणि अवकाश विज्ञान संकल्पनांची ओळख करून देण्यात आली. शिक्षकांसाठीही प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले, ज्याद्वारे त्यांना अन्वेषण-आधारित शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वर्गात प्रभावीपणे आणण्याच्या पद्धती शिकविण्यात आल्या.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचे विधान शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. तसेच सुरक्षित घर मिळत असेल तर त्यांनी त्या सुरक्षित घरात राहावे, असा सल्ला देखील म्हस्के यांनी दानवे यांना दिला आहे. इतकेच नव्हे तर अंबादास दानवे यांना आम्ही आमंत्रण देतो, ते देखील योग्यच विचार करत आहेत, असे सूचक वक्तव्य देखील म्हस्के यांनी केले आहे. नरेश म्हस्के यांनी अंबादास दानवे यांना शिंदे गटात येण्याची थेट ऑफर दिली असली तरी दानवे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नरेश म्हस्के यांनी पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर देखील खोचक टीका केली आहे. विरोधक चुकीच्या पद्धतीने टीका करत आहेत. निवडणूक धोरणाला कॉंग्रेसने विरोध केला, त्यामुळे त्यांचे दुटप्पी धोरण दिसून आले. उद्धव ठाकरे यांनी यातून दिशा घ्यावी. कॉंग्रेसच्या नादी लागून आपला कडेलोट झाला आहे त्यावर शिक्कामोर्तब झाला असल्याचे म्हस्के म्हणाले. आगामी स्थानी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या विषयी प्रतिक्रिया देताना नरेश म्हस्के म्हणाले, महायुतीच्या संदर्भातील निर्णय वरिष्ठ नेते घेत असतात. महाराष्ट्रात महायुती शंभर टक्के आहे. ही महायुती कायम राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. ज्या ज्या ठिकाणी जर एकमत झाले नाही, त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू आणि पुन्हा एकत्र येऊ, असेही म्हस्के म्हणाले. तसेच राज्याच्या सरकारमध्ये महायुतीची सत्ता कायम राहणार आहे. नंतर सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील महायुतीची सत्ता येणार असल्याचा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
पुण्यात 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी एमईए आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्स्पो 2026 चे आयोजन करण्यात येणार आहे. कृषी मैदानावर होणाऱ्या या एक्स्पोची घोषणा मराठा उद्योजक संघटना (एमईए) च्या वतीने कार्यकारी अध्यक्ष विक्रम गायकवाड आणि क्रेडाई राष्ट्रीयचे माजी अध्यक्ष सतीश मगर यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘एकतेपासून समृद्धीकडे’ या संकल्पनेवर आधारित हा भारतातील सर्वात मोठा कम्युनिटी लीड बिझनेस एक्स्पो असेल. मराठा समाजात उद्योजकता वाढवणे आणि तरुणांना उद्योग क्षेत्रातील सखोल ज्ञान देणे हा एमईएचा गेल्या 14 वर्षांपासूनचा उद्देश आहे. याच ध्येयाचा भाग म्हणून हे आंतरराष्ट्रीय एक्स्पो आयोजित केले जात आहे. परदेशातील मराठा उद्योजक, व्यावसायिक आणि नेते यांना एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न यातून होईल, असे गायकवाड यांनी सांगितले. या एक्स्पोमध्ये बांधकाम, उत्पादन, आयटी, एफएमसीजी, कृषी-तंत्रज्ञान, जीवनशैली, शिक्षण, आदरातिथ्य, सेवा, आयात-निर्यात, ऑटोमोबाईल, आरोग्य, बँकिंग-वित्त अशा विविध क्षेत्रांचा समावेश असेल. 500 हून अधिक स्टॉल्स, आंतरराष्ट्रीय व्यापारी संस्था, सरकारी प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि तज्ज्ञ यांची उपस्थिती हे या एक्स्पोचे वैशिष्ट्य असेल. हे व्यासपीठ उद्योजकांना व्यवसायवृद्धी, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी संपर्क, ब्रँड जागतिकीकरण, नव्या बाजारपेठा शोधणे आणि तज्ज्ञांचे ज्ञान मिळवणे यांसारख्या अनेक संधी उपलब्ध करून देईल. एमईएचे माजी अध्यक्ष अरुण निम्हण, सचिव राजेश कु-हाडे, सई बहिरट पाटील, नितीन भोसले, सागर तुपे आदी यावेळी उपस्थित होते. गायकवाड यांनी सांगितले की, एमईए संघटना मागील 15 वर्षांहून अधिक काळ मराठा समुदायाच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी कार्यरत आहे. एमईएकडे 2000 हून अधिक सदस्य आणि 200 यशस्वी कार्यक्रमांचा विक्रम आहे. स्वावलंबी आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मराठा व्यवसाय समुदाय घडवणे हे संघटनेचे ध्येय आहे. हे एक्स्पो केवळ एक प्रदर्शन नसून मराठा समाजाची एक प्रगतीशील चळवळ आहे. यातून नव्या संधी शोधल्या जातील आणि समुदायाचे आर्थिक भविष्य घडवले जाईल, असेही गायकवाड यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला मुंबईतील फुटपाथ विकल्याची घटना समोर आली आहे. हा 3 लाख रुपयांचा व्यवहार 2 वर्षांपूर्वी पार पडला. पण आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तो उजेडात आला. यासंबंधीच्या माहितीनुसार, मुलुंड येथे फुटपाथवर पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या संतोष गुप्ता यांना बीएमसीचा फुटपाथ विकत घेतला आहे. त्यांनी आपण हा फुटपाथ शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी अविनाश बागुल यांच्याकडून विकत घेतल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, अविनाश बागुल यांनी 2023 मध्ये फुटपाथचा एक भाग आपल्याला 3 लाखांत विकला. ही रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून बागुल यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. ही रक्कम त्यांनी कर्ज व आपल्या आईचे दागिने गहाण ठेवून जमवले. पण या जागेमुळे आपले नशीब पालटेल अशी त्यांना आशा होती. पण झाले ते भलतेच. संतोष गुप्ता मागील 2 वर्षांपासून या व्यवहाराचे दस्तऐवज तयार करण्यासाठी अविनाश बागुल यांच्या मागे लागला होता. पण ते टाळाटाळ करत होते. अखेर कंटाळून गुप्ता यांनी आपले पैसे परत मागितले. पण त्यांना ना ही जागा मिळाली ना दिलेले पैसे मिळाले. त्यानंतर आता त्यांना ज्या जागेसाठी आपण हा व्यवहार केला ती मुंबई महापालिकेची संपत्ती असल्याचे समजले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि हा घोटाळा उजेडात आला. 'मुंबई मिरर'ने हे वृत्त दिले आहे. तीन चेक दिले, पण सर्व बाऊन्स झाले संतोष गुप्ता यांनी अविनाश बागुल यांच्याकडे आपल्या पैशांची विचारणा केली, तेव्हा त्यांनी एक जुना चेक दिला. पण तो बाऊन्स झाला. त्यानंतर त्यांनी आणखी 2 चेक दिले. पण ते ही बाऊन्स झाले. संतोष गुप्ता यांनी बागुल यांच्यावर एका डोसेवाल्याकडून दरमहा 17 हजार रुपयांची वसुली करण्याचाही आरोप केला आहे. गुप्ता यांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर बागुल यांनी त्यांना दीड लाखांचा चेक दिला. पण त्यांनी ज्या बँकेचा चेक दिला त्यात तेवढी रक्कमच शिल्लक नव्हती. त्यामुळे तो चेक वठला नाही. त्यामुळे आता पोलिसांनी गुप्ता यांना कोर्टातून आदेश आणण्यास सांगितले आहे. बागुल यांनी फेटाळले गुप्ताचे आरोप दुसरीकडे, अविनाश बागुल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. संतोष गुप्ता व माझ्यात कोणताही करार झाला नव्हता. त्याने माझ्याकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. ते मी त्याला परत केले. माझ्यावरील आरोप राजकीय कटाचा भाग आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीए आघाडीवर असून जवळपास विजय हा निश्चितच झाल्याचे दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी देशात जो विषारी प्रचार चालवला आहे, त्याला जनतेने उत्तर दिल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे राजधानी दिल्ली येथे असून पत्रकारांशी संवाद साधताना बिहार निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजप आणि एनडीए या सर्व घटक पक्षांच्या बिहार युनिटचे मी अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचे आभार मानतो. त्यांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, नितीश कुमार यांच्या सुशासनावर विश्वास ठेऊन आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एनडीएच्या माध्यमातून प्रचंड मोठे बहुमत दिले आहे. 2010 चा सुद्धा रेकॉर्ड तुटू शकेल इतके बहुमत मिळाले आहे. कॉंग्रेस एमआयएम पेक्षाही खाली गेली पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, दुसरे महत्त्वाचे असे आहे की या विजयानंतर खऱ्या अर्थाने कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी देशात जो विषारी प्रचार चालवला आहे, त्याला जनतेने उत्तर दिले आहे. सातत्याने संवैधानिक संस्थांचा अपमान करणे, जनतेच्या मॅनडेटला विरोध करणे, कुठेतरी जनतेला हे लक्षात येत आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो हा त्या सरकारचा अपमान नाही तर आमच्या मताचा अपमान आहे. कॉंग्रेस एमआयएम पेक्षाही खाली गेली आहे. मला असे वाटते की कॉंग्रेसचा बिहारच्या इतिहासात सर्वात कमी मत मिळाली आहेत. राहुल गांधी यांनी तिथे मतचोरी मुद्दा चालवला, त्यावर त्यांनी यात्रा काढली, नदीत उडी टाकली. पण लोकांचा विश्वास हा मोदींवर आणि नितीश कुमार यांच्यावर आहे. मला असे वाटते की जोपर्यंत कॉंग्रेस आणि त्यांच्यासोबतचे पक्ष जोपर्यंत आत्मपरीक्षण करत नाहीत तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधक सत्य पचवत नाहीत तोपर्यंत त्यांचा पराभव होत राहणार पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, विकास आणि सुशासन हाच प्रमुख मुद्दा ठरला आहे. आणि हे लक्षात येत होते की खूप चांगल्या परिस्थितीत एनडीए आहे. पूर्वीपेक्षा जास्त चांगली परिस्थिती यावेळी दिसून आली आहे. अक्षरशः त्याचा निकाल आज आपण पाहत आहोत. मला असे वाटत होते की आपण 160 च्या पुढे जाऊ, पण त्याही पेक्षा आपण पुढे गेलो आहोत. तसेच जोपर्यंत हे लोक सत्य पचवत नाहीत तोपर्यंत त्यांचा पराभव होत राहणार, असे म्हणत फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? बिहारच्या मुख्यमंत्री पदावर कोण येणार यावर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली आहे, आता मुख्यमंत्री पदासाठी आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. यात मला बोलण्याचा अधिकार नाही. अमित शहा यांनी देखील स्पष्टपणे सगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे मी त्यावर काही बोलू शकत नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा पुरस्कार राम सुतार जे अतिशय ज्येष्ठ शिल्पकार आहेत. देशभरात त्यांच्या एवढ्या मूर्ती कोणीच तयार केलेल्या नाहीत. त्यांनी 100 वर्ष वयाचे पूर्ण केले आहेत. आता लवकरच त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देणार आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
राज्यात साथीच्या आजारांचा उद्रेक
मुंबई : राज्यात अनियमित पाऊस, साचलेले पाणी आणि बदलते हवामान या कारणांमुळे डासांची उत्पत्ती वाढली असून, मलेरिया, डेंग्यूचा, चिकनगुनियाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात मुंबई मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाची हॉटस्पॉट ठरली आहे. यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली होती. हा पाऊस नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरूच होता. या कालावधीत हवामानात सातत्याने बदल होत असल्याने साथीच्या आजारांनी डोके […] The post राज्यात साथीच्या आजारांचा उद्रेक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तलाठ्यामुळे वाचवली सरकारी जमीन
पुणे : बोपोडी येथील सरकारी मालकीची जमीन कुळमालकाच्या नावे लावण्याचा कारनामा तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी केल्याचा प्रकार जिल्हा प्रशासनात प्रशासनाच्या नजरेत आला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. असाच प्रकार ताथवडे येथील सातबारा उता-यातील इतर हक्कात सरकारी विभागाचे नाव असतानाही जमिनीच्या विक्रीचा प्रकार सजग तलाठ्याच्या कृतीमुळे उघड झाला आहे. खरेदीखत झाल्यानंतरही त्याचा अंमल फेरफारमध्ये न करता […] The post तलाठ्यामुळे वाचवली सरकारी जमीन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले असून एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. बिहारमधील 243 जागांपैकी जवळपास 200 पेक्षा जास्त जागांवर भाजप-जदयू आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेस-आरजेडी महागठबंधन फक्त 35 च्या आसपास जागांवर समाधान मानावे लागले आहे. बिहारमध्ये एनडीएचा असा मोठा विजय मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील 2025 च्या विधानसभा निवडणुकांची आठवण अनेकांना झाली आहे. कारण दोन्ही राज्यांत विरोधकांच्या मोठ्या लाटेच्या दाव्यांना निकालांनी छेद दिला आहे. बिहारचे राजकीय चित्र स्पष्ट होताच महाराष्ट्रातील नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून भाजप नेत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. बिहारमधील निकाल जाहीर होताच भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनीही या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. वोट चोरीचा मुद्दा उचलून विरोधकांनी जनतेची दिशाभूल केली, पण बिहारी जनतेने निकालातूनच स्पष्ट संदेश दिला, असे साटम यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, विरोधकांकडून उभा केलेला वोट चोरीचा कथित कथानक म्हणजे जनतेचाच अपमान असून निकालानंतर हा संपूर्ण मुद्दा कोसळला आहे. साटम यांनी म्हटले की बिहारची निवडणूक म्हणजे फक्त ट्रेलर आहे आणि खरा चित्रपट मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळेल. त्यांच्या वक्तव्याने मुंबईतील आगामी निवडणुकीसाठी भाजपने आपला सूर अधिक आक्रमक ठेवला आहे, हे स्पष्ट झाले. दुसरीकडे, शिवसेना आणि काँग्रेसकडूनही या निकालांची वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या करण्यात आली. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या प्रतिक्रियेत केंद्र सरकार, यंत्रणा आणि स्वायत्त संस्थांवरच या निकालाचे श्रेय टाकले. त्यांचा आरोप असा की, सत्ताधाऱ्यांनी वातावरण तयार करणे, विरोधकांचे आवाज दाबणे आणि सरकारी संस्थांचा प्रभाव वापरणे यामुळे निकाल एका बाजूला झुकला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर निवडणूक आयोगाचा दाखला देत बिहारचे चित्र आणि महाराष्ट्रातील काही जुन्या प्रसंगांची तुलना केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, विरोधकांना निवडणुकीबाबत समान संधी मिळाल्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे बिहारचा निकाल फक्त राजकीय विजय नसून सत्तेचा परिणाम आहे, असे ते म्हणाले. राहुल गांधींशी हातमिळवणी करणारे नेते पराभूत होत आहेत -साटम बिहारमध्ये एनडीएचा विजय साजरा करताना अमित साटम यांनी मुंबई महापालिकेवरही निशाणा साधला. त्यांनी ठामपणे दावा केला की, मुंबईत येणाऱ्या निवडणुकीत भगवा झेंडा लहरविल्याशिवाय मुंबईकर शांत बसणार नाहीत. या वक्तव्यासह त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही टीका केली. राजकारणाचे खरे पप्पू राहुल गांधीच, अशी टीका करत साटम यांनी तेजस्वी यादव आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष भाष्य केले. त्यांच्या मते, राहुल गांधींच्या राजकीय सल्ल्यामुळे त्यांच्याशी हातमिळवणी करणारे नेते पराभूत होत आहेत. त्यामुळे बिहारमधील एनडीएचा विजय, विरोधकांच्या भूमिका आणि आगामी निवडणुकांतील समीकरणांचा हा सगळा भाग एकमेकांशी थेट संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही बाजूंनी राजकीय संदेश स्पष्ट करायला सुरुवात बिहार निवडणुकीतील निकालांमुळे राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांच्या राजकारणालाही ऊत आला आहे. बिहारमध्ये जनतेने स्थिरता आणि नेतृत्वावर विश्वास दाखवला, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. तर विपक्ष या सर्व घडामोडींकडे वेगळ्या नजरेने पाहत आहे. मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना दोन्ही बाजूंनी आपापले राजकीय संदेश स्पष्ट करायला सुरुवात केली आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबई येथील हॉटेल ताज लँडच्या बाहेर राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ठाकरे गटाचे आमदार व नेते अनिल परब देखील आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले. शिवसेना ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांची फसवणूक करत भाजप प्रणीत संघटनांमध्ये घेत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यानंतर शिवसैनिक हॉटेलच्या बाहेर जमले असता गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अखिल भारतीय कर्मचारी संघ ही भाजप प्रणीत संघटना आहे, तर भारतीय कामगार सेना ही शिवसेनेची संघटना आहे. या दोन्ही संघटनांमध्ये वाद झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते हॉटेल ताज येथे दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत अनिल परब देखील उपस्थित होते. ताज लँड हॉटेलमध्ये भाजपच्या प्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी अनिल परब त्या ठिकाणी आले असता त्यांना पोलिसांनी अडवले. त्यानंतर परब यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. अनिल परब यांचा संताप कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या कार्यकर्त्यांना अडवू शकत नाही, असे म्हणत अनिल परब यांनी पोलिसांनाच जाब विचारला. यामुळे येथे काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी भाजप नेत्यांशी चर्चा करण्यासाठी फक्त अनिल परब आणि इतर काही लोकांनीच जावे असे पोलिसांनी सांगितले. त्याला अनिल परब यांनी विरोध केला. माझ्यासोबत किमान 25 लोक मी आतमध्ये घेऊन जाणार. सत्तेत आहेत म्हणून त्यांना इतका माज आलाय का? असा संतप्त सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला. कामगारांची फसवणूक केल्याचा ठाकरे गटाचा आरोप भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांना फसवून भाजपच्या अखिल भारतीय कर्मचारी संघात घेतले जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. कामगारांना फसवून त्यांच्या सह्या घेण्यात आल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. भाजपकडून हॉटेलमध्ये चुकीच्या पद्धतीने कामगार संघटना स्थापन करण्यात आली आहे, त्यात शिवसेनेच्या कामगार संघटनेच्या कामगारांच्या सह्या फसवून घेतल्याचा दावा परब यांनी केला.
पुणे : उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मूझ्रकाश्मीरमध्ये वाढलेल्या कडाक्याच्या थंडीचा परिणाम आता महाराष्ट्रातही स्पष्टपणे जाणवू लागला आहे. उत्तरेकडील थंड वारे राज्यात प्रवेश करत असल्याने गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी तापमानात लक्षणीय घट झाली. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यांमध्ये थंडीने विक्राळ रुप धारण केले असून गेल्या तीन ते चार दिवसांत तापमानाने नीचांकी पातळी […] The post राज्यातील तापमान आणखी घसरणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने उल्लेखनीय यश मिळवत बहुमताचा टप्पा सहज पार केला आहे. महागठबंधन अनेक अपेक्षा बाळगत निवडणुकीत उतरले असले तरी निकालांनी त्यांचे गणित पूर्णपणे बदलून टाकले. एनडीएच्या या विजयात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कारभाराबरोबरच भाजपने आखलेली रणनीती आणि व्यापक प्रचार मोहिमाही तितकीच महत्त्वाची ठरली. निकाल जाहीर होण्यास सुरुवात होताच एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे संकेत मिळाले. यामुळे पुढील सत्तास्थापनेची चर्चा सुरू झाली असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आता एनडीएतील पाचही पक्ष एकत्र बसून घेणार असल्याची माहिती भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी दिली. विनोद तावडे यांनी स्पष्ट केले की, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही निवडणूक लढलो. आता पुढे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणता निर्णय घ्यायचा, हे एनडीएतील सर्व पक्ष मिळूनच ठरवतील. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. आगामी दोन ते चार दिवसांत मुख्यमंत्रीपदासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे तावडे यांनी सांगितले. यामुळे एनडीएतील अंतर्गत चर्चांना वेग आला असून नव्या सरकारची रूपरेखा कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिहारमध्ये भाजपने या निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत महागठबंधनला जोरदार टक्कर दिली. प्रचाराच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जंगलराजाचा मुद्दा उचलून विरोधकांना चांगलेच घेरले. यामुळे मतदारांना पुन्हा एकदा मागील काळातील अस्थिरता, कायदा-सुव्यवस्था आणि विकासाच्या अडचणींची आठवण झाली. मोदी-नितीश यांच्या जोडीला मिळालेला प्रतिसाद हा एनडीएच्या विजयाचा मोठा आधार मानला जातो. कालांतराने मतदारांचा कलही स्पष्टपणे एनडीएकडे झुकताना दिसला. या निकालामुळे एनडीएच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवण्यात मतदारांनी पुढाकार घेतला आहे. तावडे यांची सूक्ष्म रणनीती महत्त्वाची ठरली एनडीएच्या विजयानंतर भाजपातील काही प्रमुख रणनीतीकारांचे नाव विशेष चर्चेत आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतच भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांचे नाव सर्वाधिक पुढे आहे. बिहारमध्ये उमेदवार निवड, प्रचाराची आखणी, बूथस्तरापर्यंत संघटनाचे नियोजन आणि महत्त्वाच्या सीटांवर विशेष लक्ष ठेवणे यामध्ये तावडे यांनी विशेष मेहनत घेतल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे की, बिहारमध्ये एनडीएला मिळालेल्या मोठ्या आघाडीच्या मागे तावडे यांची सूक्ष्म रणनीती महत्त्वाची ठरली. विशेष म्हणजे मैथिली ठाकूर यांना उमेदवार करणार्या निर्णयामागेही त्यांची मोठी भूमिका असल्याचे बोलले जाते. भाजप तावडेंना मोठी जबाबदारी देऊ शकते या पार्श्वभूमीवर विनोद तावडेंना आता मोठे पक्षपद मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. बिहारमध्ये नव्या सरकारच्या शपथविधीनंतर भाजप तावडेंना राज्यात मोठी जबाबदारी देऊ शकते, असे कयास लावले जात आहेत. काही सूत्रांचे मत आहे की त्यांना भाजपच्या बिहार राज्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. निवडणुकीतील त्यांच्या नियोजनाची पक्षाने दखल घेत पक्ष संघटनात त्यांना अधिक महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. एनडीएच्या विजयामुळे बिहारची राजकीय दिशा पुढील काही दिवसांत अधिक स्पष्ट होईल. नितीश कुमार कायम मुख्यमंत्रिपदावर राहणार की नव्या नेतृत्वाची निवड होणार? हे आगामी बैठकीनंतर स्पष्ट होणार असून बिहारची राजकीय समीकरणे आता निर्णायक टप्प्यात येत आहेत.
बाल दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील १४ ब या विशेष मुलांच्या शाळेत एका अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल ग्रुप आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनने संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यात विशेष मुलांनी विविध खेळांचा आनंद लुटला. यावेळी रिद्धी हिंगोरानी, भाविका हिंगोरानी, निकिता अरोरा, ग्लोबल ग्रुपच्या एचआर उपाध्यक्ष जयश्री राव आणि त्यांच्या टीमचे सदस्य अल्तमश इनामदार व रेखा भोसले यांनी विशेष मुलांसोबत संगीत खुर्ची, पासिंग बॉल, बाऊची यांसारखे विविध खेळ खेळले. दिव्यांग असूनही मुलांनी अत्यंत उत्साहाने सर्व खेळ खेळून पारितोषिके जिंकली. मुलांनी कसरती, प्रार्थना आणि राष्ट्रगीताचे प्रात्यक्षिकही सादर केले. ग्लोबल ग्रुपचे संचालक मनोज हिंगोरानी आणि संजीव अरोरा यांनी सांगितले की, त्यांच्या मुलांना समाजकार्याची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी समाजातील वंचित घटकांप्रती आपले कर्तव्य बजावावे, या हेतूने त्यांना अशा उपक्रमांसाठी प्रेरित केले जाते. क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले की, नवीन पिढीमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी आणि आपल्याकडील जास्तीच्या वस्तू दुर्लक्षित व वंचित घटकांना देण्याची सवय लागावी यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील आहे. रिद्धी हिंगोरानी, भाविका हिंगोरानी आणि निकिता अरोरा यांनी स्पष्ट केले की, या मुलांसोबत वेळ घालवणे हा त्यांच्यासाठी खूप सुखद क्षण होता. यापुढे राष्ट्रीय दिवस, सण, वाढदिवस आणि इतर प्रसंगी अशा विविध शाळांमध्ये जाऊन कार्यक्रम आयोजित करण्याचा आणि मदत करण्याचा त्यांचा मानस आहे. क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी हा क्षण भावनिक असल्याचे नमूद केले. केवळ भेटवस्तू किंवा निधीची मदत न करता, या मुलांसोबत वेळ घालवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विशेष मुलांसाठी फुटबॉल, कॅरम बोर्ड, बॅडमिंटन सेट, रिंग, आर्ट क्राफ्ट बुक, रंगकाम बुक, चित्रकला वही, कलर, ब्रश, एक रेघी, दोन रेघी, चार रेघी व चौकोनी वह्या, पेन्सिल खोडरबर सेट, व्हॉलीबॉल आणि इतर शैक्षणिक व क्रीडा साहित्य भेट देण्यात आले.
पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरात बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण भागात खळबळ उडवली आहे. चारोळीतील अलंकारपूरम ९० फूट रोडवर एका व्यावसायिकाचा त्याच्याच ओळखीतील व्यक्तींनी फॉर्च्युनर कारमध्ये बसवून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीची ओळख नितीन शंकर गिलबिले (३८, रा. वडमुखवाडी, चहोली) अशी झाली आहे. जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आणि हॉटेल व्यवसाय करणारे […] The post व्यावसायिकाचा मित्राकडून खून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एनडीएच्या बिहारमधील विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बिहारमध्ये महाराष्ट्रात वापरण्यात आलेले फंडेच वापरण्यात आले. यामुळे तेथील निवडणूक प्रक्रिया निकोप होती का? हा प्रश्न उपस्थित होत आहे, असे ते म्हणालेत. बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीए विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या निकालाचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. सत्ताधारी पक्ष विशेषतः भाजपने मतचोरीच्या मुद्यावरून काँग्रेससह संपूर्ण विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी एनडीएच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातील फंडे बिहारमध्ये वापरले गेले. त्यामुळे लोकशाहीसाठी अशी निवडणूक प्रक्रिया खरेच योग्य आहे का? याचा विचार जनतेने केला पाहिजे. लोकशाही निरोगी व निकोप आहे का?बिहारमध्ये जागा वाटपाच्या मुद्यावर महाआघाडीमध्ये काही गोंधळ होता का? त्यामुळेच हा पराभव झाला का? असा प्रश्न यावेळी थोरातांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, याविषयी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून सविस्तर निवेदन केले जाईल. नेमका काय गोंधळ झाला हे तेच अधिक विस्ताराने सांगू शकतील. पण जे महाराष्ट्रात झाले तेच बिहारमध्ये घडले हेच सर्वांना वाटत आहे. महाराष्ट्रात वापरण्यात आलेले फंडे तिथे वापरण्यात आले. ही वस्तुस्थिती दिसत आहे. आपली लोकशाही निकोप पद्धतीने वाटचाल करत आहे का? ती निरोगी आहे का? कोणत्या पद्धतीने आपल्या निवडणुका घेतल्या जातात व जिंकल्या जातात याचा विचार जनतेने केला पाहिजे. विशेषतः निरोगी लोकशाहीसाठीची लढाई आम्हाला यापुढेही कायम ठेवावी लागेल. पराभवाचे आत्मचिंतन, अभ्यास करावा लागेल बाळासाहेब थोरात म्हणाले, बिहारमधील पराभवाचे आत्मचिंतन व अभ्यास करावा लागेल याविषयी कोणतेही दुमत नाही. पण आमची लढाई आहे ती निकोप लोकशाहीसाठी. जय - पराजय हा निवडणुकीचा भाग आहे. आपल्या संविधानाने पक्ष - पक्षांतर, मत - मतांतरे दिली आहेत. सत्ता दिली, विरोधी पक्ष दिला. पक्ष दिले. असे असताना निकोप पद्धतीने ही प्रक्रिया होते का? तर नाही असे माझे उत्तर आहे. सत्ता मिळवण्यासाठी अनेक फंडे वापरले जातात. बिहारमध्ये महाराष्ट्रासारखाच निकाल उल्लेखनीय बाब म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रासारखाच विरोधकाचा पुरता सफाया झाला आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी 206 जागांवर एनडीएने आघाडी घेतली आहे. तर राजद - काँग्रेस आघाडीला अवघ्या 30 जागांवर आघाडी मिळाली आहे. अनेक मतदारसंघांत अजूनही मतमोजणी सुरू असल्यामुळे या आकड्यांत बदल हो शकतो. हे ही वाचा... बिहारमध्ये अजितदादांचे सर्व उमेदवार 500 च्या आत:राष्ट्रवादीने 14 जागांवर लढवली होती निवडणूक; कुणालाही पाडता आली नाही छाप मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीएने विरोधी बाकावरील महाआघाडीचा पुरती दाणादाण उडवली आहे. बिहारमध्ये पुन्हा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. त्यात आता वेगवेगळ्या पक्षांनी केलेली सुमार कामगिरीही समोर येत आहे. वाचा सविस्तर
सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विजयाबद्दल लाडक्या बहिणींचे आभार मानले आहेत. लाडक्या बहिणींनी हिरीरीने मतदान केल्यामुळेच बिहारमध्ये एनडीएचा लँडस्लाईड विजय झाला, असे ते म्हणालेत. बिहारच्या जनतेने या जनादेशामुळे लालूंचे जंगलराज नाकारल्याचेही ते यावेळी म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीत राजद व काँग्रेसच्या महाआघाडीचा पार धु्व्वा उडाला आहे. तर सत्ताधारी एनडीएचा ऐतिहासिक विजय झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीएचे सरकार सलग पाचव्यांदा येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एनडीएच्या या विजयात बिहारमधील महिलांना निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या करण्यात आलेल्या मदतीचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याची पुष्टी केली आहे. लाडक्या बहिणींमु्ळेच बिहारमध्ये भाजपला दैदिप्यमान विजय मिळाल्याचे ते म्हणालेत. लाडक्या बहिणींमुळे एनडीएचा मोठा विजय एकनाथ शिंदे म्हणाले, बिहारमध्ये एनडीएचा मोठा विजय झाला. तेथील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारमध्ये केलेल्या विकासावर विश्वास ठेवला. त्यामुळे मी त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. एवढेच नाही तर मी लाडक्या बहिणींचेही अभिनंदन करतो. कारण, लाडक्या बहिणींनी तिथे मोठ्या प्रमाणात मतदान केले. महाराष्ट्रात लाडक्या बहिणींचे मतदान वाढल्यामुळे लँडस्लाईड व्हिक्ट्री मिळाली. तशीच लँडस्लाईड व्हिक्ट्री बिहारमध्ये लाडक्या बहिणींमुळे मिळाली. बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारले आणि विकासराज स्वीकारले. त्यामुळे एनडीएला अशा प्रकारचा विजय मिळाला. जब तक रहेगा आलू, तब तक रहेगा विकास का राज चालू शिंदे म्हणाले, पूर्वी लोक घोषणा द्यायचे की, जब तक रहेगा समोसे में आलू, तब तक बिहारमध्ये रहेगा लालू. पण आता असे झाले आहे की, जब तक रहेगा आलू तब तक रहेगा विकास का राज चालू. बिहारच्या लाडक्या बहिणींनी विकासाला महत्त्व दिले आहे. त्यामुळे तिथे विकासाची राजवटच सुरू राहील. लोकांनी लालूंचे जंगलराज नाकारले. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचे सरकार होते तेव्हा जनतेची सायंकाळी 6 वाजेनंतर रस्त्यावर फिरण्याची हिंमत होत नव्हती. व्यापारी आपली दुकाने बंद करत होते. मी बिहारमध्ये प्रचाराला गेलो तेव्हा लोक तेथील जंगलराजविषयी सांगत होते. तिथे दिवसाढवळ्या हत्या, लूट व बलात्कार होत होते. पण नितीशकुमार यांच्या काळात हे सर्व चित्र बदलले. त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो. विरोधकांना सुबुद्धी आली पाहिजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने बिहारमध्ये डबल इंजिनचे सरकार विकासाचे काम पुढे नेईल. मतदारांनीही डबल इंजिनच्या सरकारवर विश्वास दाखवला आहे. विशेष म्हणजे बिहारमधील एसआयआर नंतरचा हा पहिला विजय आहे. याचा अर्थ निवडणूक प्रक्रियेत पूर्णतः पारदर्शकता आली. पण त्यानंतरही हे विरोधक त्यावर टीका केल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे काम टीका करण्याचे आहे. आता तरी त्यांचे डोळे उघडले पाहिजेत. त्यांना सुबुद्धी आली पाहिजे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यातील १६.३ टक्के बालकांचा न्यूमोनियामुळे मृत्यू
अकोला/नागपूर : राज्यातील एकूण बाल मृत्युपैकी १६.३ टक्के मृत्यू हे न्यूमोनिया आजारामुळे होतात. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आजारावर समाजामध्ये जागृती करणे, आजारापासून संरक्षण करणे, आजाराचा प्रतिबंध करणे याविषयी माहिती प्रचार-प्रसिद्धी करण्याचे उद्देशाने विशेष मोहीम राबवली जात आहे. तीव्र श्वसनदाह आजारामुळे होणारे बाल मृत्यू टाळण्यासाठी राज्यात सांस मोहीम सुरू झाली. सांस मोहिमेद्वारे ‘न्यूमोनिया यशस्वीपणे निष्फळ करण्यासाठी […] The post राज्यातील १६.३ टक्के बालकांचा न्यूमोनियामुळे मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोलीच्या एसपींची बदली होणार?:पालिका निवडणुकीच्या तोंडावर चर्चेला उधाण, राजकीय दबाव असल्याचा दावा
हिंगोली जिल्हयातील नगर पालिका निवडणुकीत पोलिस अधिक्षकांच्या बदलीच्या चर्चेला उधाण आले असून केवळ राजकिय दबावापोटी त्यांची बदली केली जात असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे नागरीकांमधून मात्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. हिंगोली जिल्हा पोलिस दलात मागील सुमारे दीड वर्षापुर्वी रूजू झालेले पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यात गुन्हेगारांवर चांगलाच वचक बसविला आहे. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले. तर अवैध व्यवसाय करणाऱ्यांना तंबी देऊन त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई देखील केली आहे. जिल्ह्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल झालेल्या गुन्हेगारांची माहिती सादर करण्याच्या सूचना ठाणेदारांना दिल्या होत्या. यामध्ये गंभीर गुन्हे असलेल्या तब्बल ५५ पेक्षा अधिक गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून पाच पेक्षा अधिक गुन्हेगारांना स्थानबध्द करण्यात आले आहे. त्यामुळे अवैध व्यवसाय व गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला आहे. या शिवाय महसूल पथकाच्या बरोबरीने पोलिस विभागाने वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ४० पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात पोलिस विभागाची कामगिरी चांगली असतांनाही आता पालिका निवडणुकीत पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या बदलीची चर्चा सुरु झाली आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांकडूनच राजकिय दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची नागरीकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. या बदलीच्या चर्चेने नागरीकांमधून मात्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सत्ताधारांच्या कुरघोडीच्या वादात पोलिस अधीक्षकांच्या बदलीचा प्रयत्न सुरु झाल्याचे चित्र दिसू लागले असून बदलीच्या दररोजच अफवा पसरू लागल्याने नागरीकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या एका शेतकऱ्याला खामगावच्या नायब तहसीलदारांनी '7 दिवसांनी कशाला मरता, पेट्रोल आणून देतो आत्ताच मरा', असे विचित्र उत्तर दिल्याची बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत महायुती सरकारला धारेवर धरले आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन देणाऱ्या शेतकऱ्याला प्रशासकीय अधिकारी मरण्याचा सल्ला देत असतील तर शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारची प्राथमिकता काय आहे हे स्पष्ट होते, असे ते म्हणालेत. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगापूर येथील शेतकरी गोविंद सोपान महाले गुरुवारी शेतात जाण्यासाठी रस्ता मिळवून देण्याच्या मागणीसाठी खामगाव तहसील कार्यालयात गेले होते. शेताला जाण्याचा रस्ता 7 दिवसांत मिळाला नाही तर मी आत्मदहन करेन, असा इशारा त्यांनी आपल्या यासंबंधीच्या निवेदनात प्रशासनाला दिला होता. त्यावर नायब तहसीलदार निखील पाटील यांनी त्यांना 7 दिवसांनंतर नव्हे तर आत्ताच आत्मदहन करण्याचा सल्ला दिला. 7 दिवसाने का मरता मी पेट्रोल आणून देतो आत्ताच मरा, असे ते म्हणाले. वाद वाढताच निखील पाटलांनी काढला पळ नायब तहसीलदारांच्या या उत्तरामुळे गोविंद महाले संतप्त झाले. त्यांनी खामगाव तहसील कार्यायावर जाऊन तेथून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण तिथे हजर असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले. त्यानंतर ही गोष्ट शिवसेनेचे कार्यकर्ते व काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या कानावर गेली. त्यांनी नायब तहसीलदारांना त्यांनी केलेल्या विधानाचा जाब विचारला. त्यावर निखील पाटील यांनी थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पण वातावरण चिघळत येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तहसील कार्यालयातून पळ काढला. महायुतीचे अधोगतीमान प्रशासन आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, कशाला सात दिवसाने मरता? त्यापेक्षा आत्ता पेट्रोल आणून देतो लगेच मरा हे शब्द कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याचे नाही तर महायुती सरकारच्या अधोगतिमान प्रशासनातील एका निष्ठूर नायब तहसीलदाराचे आहेत. आपल्या मागण्यांचे निवेदन देणाऱ्या शेतकऱ्यांना मरण्याचा सल्ला देण्याइतके प्रशासकीय अधिकारी खालच्या पातळीला जात असतील, तर शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना सरकारची काय प्राथमिकता आहे हे स्पष्ट दिसून येते. सामान्यांनी न्यायासाठी कुणाकडे जायचे? अगोदरच अतिवृष्टीने बेजार झालेल्या शेतकऱ्यांचे मनोबल खचलेले असताना आणि त्यांनी टोकाची भूमिका स्वीकारत, त्यांची आत्महत्येची मानसिकता झालेली असताना, खरंतर सरकारने धीर देणे अपेक्षित असते. या नायब तहसीलदार महाशयांना ही साधी बाब देखील समजत नाही का? अशावेळी सामान्यांनी न्याय हक्क मागायला सरकारकडे जायचं तरी कसं? बळीराजाचे नुकसान झालं तर त्यांना मदत करायची सोडून, मरण्याचा विचित्र सल्ला देणाऱ्या नायब तहसीलदारांना महसूलमंत्री तत्काळ समज देतील हि अपेक्षा, असे ते म्हणाले.
पाटना : बिहार निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. २४३ जागांसाठीच्या कलांमधून एनडीएला स्पष्ट यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. एनडीए २०० जागांवर आघाडीवर आहे आणि महाआघाडी ३९ जागांवर आघाडीवर आहे. २०२० च्या तुलनेत एनडीएला ६५ पेक्षा जास्त जागा मिळत आहेत, तर महाआघाडीला जवळजवळ तितक्याच जागांचे नुकसान होत आहे. गेल्या वेळी ४३ जागांपर्यंत मर्यादित असलेले जेडीयू […] The post बिहारमध्ये एनडीएचे द्विशतक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अहिल्यानगर : लेकीच्या साखरपुड्यात पैशांची उधळण, गाड्यांचा ताफा, थाटमाट यावरून लोकांनी त्यांना सुनावलं. मात्र आता या सर्व टीकेला इंदुरीकर महाराज यांनी थेट उत्तर दिले असून त्यावर भाष्य करत टीकाकारांना सुनावले असून लेकीचे लग्न आतातर टोलेजंगच करणार असल्याचा निर्धार इंदुरीकर महाराज यांनी केला आहे. नुकतेच त्यांचे कीर्तन पार पडले, त्यावेळी त्यांनी टीकाकारांना खडेबोल सुनावले. माझ्यापर्यंत ठीक […] The post लेकीचे लग्न टोलेजंग करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अर्ज भरल्यानंतरच उमेदवारांची यादी जाहीर करणार
मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठीची उमेदवार यादी आधी जाहीर करण्याऐवजी १७ नोव्हेंंबरला म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपल्यानंतर ती जाहीर करण्याचा विचार प्रदेश भाजप करत आहे. बंडखोरीवर हा उपाय शोधल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. भाजपचे उमेदवार निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, निवडणूक प्रमुख व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी […] The post अर्ज भरल्यानंतरच उमेदवारांची यादी जाहीर करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कात्रज प्राणिसंग्रहालयाच्या तिकीट दरात वाढ होणार
पुणे : महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेश शुल्कामध्ये(तिकीट दर) ५० टक्के वाढ होणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव उद्यान विभागाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. प्राणिसंग्रहालयातील उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. कात्रज येथे असलेले हे संग्रहालय पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे प्राणिसंग्रहालय आहे. त्यामुळे राज्यासह पुणे शहरातील पर्यटक […] The post कात्रज प्राणिसंग्रहालयाच्या तिकीट दरात वाढ होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

28 C