पुणे शहरातील गुन्हेगारी जगतात नावाजलेल्या नीलेश घायवळ टोळीविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली असून या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. घायवळ टोळीचा सक्रीय साथीदार अजय सरोदे याच्या घरातून 400 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यापैकी 200 जिवंत काडतुसे, तर 200 रिकाम्या पुंगळ्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोथरूड पोलिसांनी अजय सरोदे आणि त्याचा आणखी एक साथीदार बटर्या चौधरी यांना तीन दिवसांपूर्वी गाणगापूर (कर्नाटक) येथून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली असून, या सर्व घडामोडींमुळे पुन्हा एकदा पुण्यात दहशत पसरली आहे. 17 सप्टेंबर रोजी कोथरूड भागात घायवळ टोळीने एका तरुणावर सरळ गोळीबार केला होता. त्या घटनेच्या वेळी अजय सरोदे हा घटनास्थळी उपस्थित असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्या गुन्ह्यात देखील अजय आरोपी म्हणून सामील आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, अजय सरोदे याच्याकडे कायदेशीर पिस्तुल परवाना देखील आहे. 29 जानेवारी 2024 रोजी त्याला हा परवाना पोलिसांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. परवानाधारक असूनही त्याच्या घरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आढळल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या काडतुसांचा वापर कोणत्या बेकायदेशीर कृत्यांसाठी होणार होता? कोणत्या व्यवहारांसाठी त्यांची साठेबाजी केली जात होती? याचा सखोल तपास सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मनी लॉन्डरिंग केल्याचा संशय पोलिसांच्या तपासानुसार, नीलेश घायवळने पुण्यात दहशत निर्माण करून जमीनखरेदी-विक्रीचे बेकायदेशीर व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. कमी किमतीत जमिनी घ्यायच्या, धमकावून दस्तऐवज पूर्ण करायचे आणि नंतर त्यातून कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार करायचे असा या टोळीचा कारभार असल्याची माहिती मिळत आहे. एवढेच नव्हे तर या टोळीने खंडणी उकळणे, तस्करीसारखे संशयास्पद व्यवहार आणि मोठ्या प्रमाणात मनी लॉन्डरिंग केल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. या सर्व आर्थिक गैरव्यवहारांचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी ईडीला अधिकृत पत्र पाठवले आहे. त्यामुळे एक मोठा आर्थिक गुन्हा आता उघडकीस येण्याची शक्यता आहे. अनेक गुन्ह्यांची एकमेकांशी सांगड तर दुसरीकडे, नीलेश घायवळविरुद्ध 45 लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात आधीच गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. याशिवाय कोथरूडमध्ये गोळीबार, कोयत्याचा हल्ला तसेच कंपनीकडून झालेल्या संशयास्पद पैशाच्या देवाणघेवाणीप्रकरणी सुद्धा घायवळ टोळीवर मकोकाचे तीन गुन्हे दाखल केले गेले आहेत. त्यामुळे या टोळीची गुन्हेगारी मुळे किती खोलवर रुजली होती याचा अंदाज येतो. पोलिसांनी आधीच या प्रकरणात अनेक गुन्ह्यांची एकमेकांशी सांगड घालण्यास सुरुवात केली आहे. दारुगोळा कुठून आला? या मोठ्या कारवाईनंतर घायवळ टोळीतील इतर सदस्यांविषयीही पोलिस तपास जोरात सुरू आहे. दारुगोळा कुठून आला? त्याची खरेदी कोणाकडून आणि कशासाठी करण्यात आली? गोळीबाराच्या घटनांमध्ये या शस्त्रांचा वापर झाला का? अजयला परवाना मिळवून देताना कोणाचा हातभार होता? याचा तपास आता संवेदनशील टप्प्यात पोहोचला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे की कोणताही गुन्हेगार पळून जाणार नाही आणि घायवळ टोळीचा संपूर्ण गुन्हेगारी कारभार उघडा पडल्याशिवाय तपास थांबणार नाही. त्यामुळे पुण्यातील नागरिकही आता या तपासाच्या निकालाकडे उत्सुकतेने पाहत आहेत.
वसमत येथील जुम्मापेठ भागातील बेपत्ता ज्येष्ठ नागरीकाचा मृतदेह त्यांच्यात शेतातील पाण्याच्या चारीमध्ये आढळून आला असून थंडीमुळे काकडून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 2 सायंकाळी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील जुम्मापेठ भागातील रहिवासी असलेले उस्मानखान हबीबखान (85) यांचे वसमत शिवारात शेत आहे. या शेतात त्यांनी ऊसाची लागवड केली आहे. त्यांच्या शेतातूनच कालव्याची चारी देखील गेली आहे. उस्मानखान हे वेळ मिळेल तेव्हा शेतात जातात. दरम्यान, मागील पंधरा दिवसांपासून ते अचानक बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला मात्र त्यांचा कुठेही शोध लागला नाही. या शिवाय नातेवाईकांकडेही त्यांची माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी वसमत शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली होती. यावरून पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची नोंद देखील झाली होती. दरम्यान, दोन दिवसापूर्वी त्यांच्याच शेतात दुर्गधी सुटल्यामुळे काही जणांनी पाहणी केली असता त्या ठिकाणी उस्मानखान यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक खंदारे, जमादार गजानन भोपे, राजेश वळसे यांच्या पथकाने पाहणी केली. मयत उस्मानखान यांचा चारीमध्ये पडून तसेच थंडीने काकडून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणी बिस्मील्लाखान यांच्या माहितीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 2 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईतील गौरी पालवे मृत्यू प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत असून या प्रकरणाने मोठे वळण घेतले आहे. गौरीचा मृत्यू झाल्याची माहिती अनंत गर्जेपर्यंत पोहोचताच त्याने मानसिक धक्क्याच्या अवस्थेत स्वतःचे डोके भिंतीवर आपटण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. यामुळे त्याच्या डोक्याला जखमा झाल्याची पुष्टी अधिकृतपणे झाली आहे. त्याचबरोबर, अनंतने खिडकीतून घरात प्रवेश केला होता, अशीही माहिती तपासात पुढे आली आहे. या खिडकीला बसवण्यात आलेल्या जाळीतून नेमके कसे प्रवेश करता येते, याचे प्रात्यक्षिकही पोलिसांनी संबंधित व्यक्तीकडून करवून घेतले आहे. त्यामुळे घरात प्रवेश करताना काय घडले आणि ते का घडले? याचा तपास अधिक गतीने सुरू आहे. गौरी पालवे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक स्वरूपात समोर आले असले, तरी या घटनेमागील कारणांची मालिका अधिक धक्कादायक असल्याचे तपासात स्पष्ट होत आहे. गौरीच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरकडील नातेवाईकांनी तिच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातही या घटनाक्रमाची मोठी चर्चा सुरू आहे. कारण अनंत गर्जे हे भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए म्हणून कार्यरत होते. त्यामुळे या प्रकरणाकडे राजकीय परिणामांच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. गौरी आणि अनंत यांच्या वैवाहिक आयुष्यातील वाद, भावनिक ताणतणाव व परस्परांतील मतभेदांचा या मृत्यूशी संबंध आहे का? हे तपासणे पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले आहे. तपासादरम्यान अनंत गर्जेच्या शरीरावर एकूण 28 ताज्या जखमा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या जखमा अचानक पडल्याने किंवा एखाद्या अपघातातून नव्हे तर झटापटीत झाल्याचे संकेत तपासात पुढे आले आहेत. पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार गौरी आणि अनंत यांच्यात मृत्यूपूर्वी तीव्र वाद व संघर्ष झाल्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आत्महत्या व खून या दोन्ही कोनातून तपास सुरू आहे. अनंतचे मनोवैज्ञानिक विश्लेषण व पॉलिग्राफ म्हणजेच लाई डिटेक्टर टेस्ट करण्याची प्रक्रिया सुरू असून तज्ज्ञांच्या मदतीने घटनेच्या प्रत्येक शक्यतेचा शोध घेतला जात आहे. याशिवाय, आवश्यक वाटल्यास अनंतची पोलिस कोठडी कायम ठेवण्याची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली आहे. वॉइस रेकॉर्डिंग्ज, चॅट्स, सीसीटीव्ही फुटेज जप्त या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आलेला होता. त्यामुळे वरळी पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे. चौकशीत तिने अनंतसोबत 2022 नंतर कोणताही संबंध नसल्याचे सांगितले आहे. तसेच गौरीच्या घरी मिळालेल्या काही कागदपत्रांबद्दलही तिला कोणतीच माहिती नसल्याचा दावा तिने केला आहे. पोलिसांनी सर्व डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा, वॉइस रेकॉर्डिंग्ज, चॅट्स, तसेच घरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून प्रत्येक गोष्ट काटेकोर तपासली जात आहे. घटनेच्या काही तास आधी दाम्पत्यात काय घडले, कोणते संदेश किंवा फोन कॉल्स झाले, हे तपासात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आत्महत्या केली नाही तर तिला प्रवृत्त केले गेले दरम्यान, गौरीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांचा मानसिक आक्रोश अधिक तीव्र झाला आहे. ते स्पष्टपणे म्हणतात की गौरीने आत्महत्या केली नाही तर तिला प्रवृत्त केले गेले. त्यामुळे न्यायालयीन कारवाई योग्य दिशेने होईल अशी त्यांची अपेक्षा आहे. समाजमाध्यमांवरही या प्रकरणावर प्रचंड चर्चा होत असून अनेकांनी महिलांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. सुशिक्षित कुटुंबातही पती-पत्नीतील तणाव इतका वाढू शकतो की मृत्यूच अंतिम पर्याय ठरू शकतो, ही बाब चिंतेची आहे. पोलिस तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशी अधिक तथ्ये समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यायालयीन प्रक्रिया आणि पुढील तपास हा कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
जगात मित्रत्वाला मोठे महत्व असून अगदी कृष्ण-सुदामाच्या मित्रत्वाने मोठी परंपरा अध्यात्मिक जगतात निर्माण केली आहे. गरीब- श्रीमंतातील भेद मिटवा, ही भूमिका या मित्रत्वात दिसून येते. त्यामुळे मित्रत्व हे खरे व परोपकारी असावयाला हवे; तरच मित्रत्वाची प्रदीर्घ परंपरा निर्माण होऊ शकते, असा हितोपदेश गोपाल महाराज कारखेडकर यांनी केला. जवाहर नगर येथील छत्रपती राजे संभाजी पार्क येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेत गोपाल महाराज यांनी कथेचे सप्तम पुष्प गुंफत होते. आशिष पवित्रकार मित्र परिवार व भागवत सेवा समिती च्या वतीने गुरुवर्य संत वासुदेव महाराज यांच्या स्मरणार्थ व स्व बाबुराव पवित्रकार यांच्या स्मृतीत कथा आयोजित करण्यात आला. पू. गोपाल महाराज पुढे म्हणाले की, भगवंत हे भक्ताला मार्गदर्शन करीत असतात. ते कृष्णासारखे मित्रासमान असतात. प्रभू आपल्या सखा रुपी भक्ताचे प्रारब्ध बदलून टाकतात. म्हणून भगवंत व साधूंची संगत करून शाश्वत सुख प्राप्त करण्याचे आवाहन गोपाल महाराज यांनी केली. रोज भागवत कथा श्रवण करण्याचे आवाहन करत आपल्या कथेस विराम दिला. सूत्रसंचालन डॉ. संचालन जीवन देशमुख यांनी केले. सुदामाचा भक्तिमय देखावा भागवत कथेतील अंतिम सत्रात गोपाल महाराज यांनी कृष्ण- सुदामाची रोमहर्षक व भक्तिमय कथा प्रतिपादित केली. कथेत विजय खंडाळकर यांनी सुदामाचा भक्तिमय देखावा साकार केला. यावेळी संगीत मंडळींनी सादर केलेल्या अरे द्वारपालो, कन्हैया से कह दो' या गीताने परिसर भक्तिमय झाला. अनेक भक्तांनी यावेळी सामूहिक नृत्य करून कृष्ण भक्तीचा जल्लोष साजरा केला.
अकोला हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर' यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त राज्य शासन आणि शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून, आवश्यक सुविधांची पूर्तता व्हावी. या उपक्रमांची माहिती सर्वदूर पोहोचवा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सोमवारी येथे दिले. जिल्हाधिकाऱ्या यांच्या अध्यक्षतेत समिती सदस्य व समाजबांधवांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला गुरमितसिंग गोसल, इंद्रजीतसिंग गुजराल, सुरजीतसिंग अकाली, रमेश पवार, विजय चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर आदी उपस्थित होते. ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यातील, तसेच विदर्भातील अनेक भाविक यावेळी नागपूरला जाणार आहेत. गौरवशाली इतिहासाच्या स्मृती सोहळ्यानिमित्त शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाजाचे गुरुबंधुत्व नाते अधिक दृढ होणार आहे. समन्वय समितीच्या माध्यमातून प्रचार व प्रसाराचे कार्य यशस्वीपणे पार पाडणार आहे. श्री गुरू तेग बहादूर यांची शहादत व योगदान हे धर्म आणि मानवतेच्या रक्षणाचे तेजस्वी प्रतीक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याचा आणि श्रद्धेचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे या सहा समाजाच्या गौरवशाली, पराक्रमी आणि धर्मनिष्ठ इतिहासाला नवे बळ मिळणार असून गुरुबंधुत्वाचा हा पवित्र वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. करूणा, धैर्याचा संदेश श्री गुरू तेग बहादूर यांच्या कार्याचा आणि हौतात्म्याचा इतिहास सर्वदूर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचवण्यात येणार आहे. अकोल्यात मोटरसायकल रॅली व इतर उपक्रमांचे आयोजन होत आहे. श्री गुरू तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरू आहेत. मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी कार्य करताना ते शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, मानवता, करूणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमानिमित्त नागपूर येथे भव्य कार्यक्रम होत आहे. आज मोटरसायकल रॅली शहरात बुधवारी गुरुद्वारा सिंघ सभा येथून मोटरसायकल रॅली निघेल. विविध समाजबांधव मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी होणार आहेत. रॅली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथून पुढे न्यायालय, सातव चौक, राऊतवाडी चौक, रतनलाल प्लॉट, नेहरू उद्यान, गोरक्षण रस्ता, पुढे कौलखेडवरून सिंधी कँप, अशोक वाटिका, बसस्थानक, चांदेकर चौक, गांधी चौक, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय अशी जाऊन न्यू राधाकिशन प्लॉट येथे गुरुद्वारा येथे समारोप होणार आहे. समिती सदस्य व समाजबांधवांच्या उपस्थितीत बैठक झाली.
चान्नी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ग्राम दिग्रस बुद्रुक येथे लिंबू, मिरच्या, हळद- कुंकवाचा, अंधश्रद्धेचा प्रकार केल्याने तेथून येणाऱ्या-जाणाऱ्या ग्रामस्थ महिलांच्या नजरेत पडताच त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. गावातील ग्रामस्थ, महिला सकाळी ५ ते ६ वाजता दरम्यान फिरायला जात असताना ग्रामपंचायत कार्यालयासमोर विचित्र प्रकार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सार्वजनिक ठिकाणी ग्रामस्थ बसून गाव गप्पा करतात त्या ठिकाणी चुना भुकटीने स्टारची आकृती काढून त्यामध्ये दोन अगरबत्ती, दोन लिंबू, त्यामध्ये एक पिवळे, एक हिरवे यामध्ये लहान काड्या टोचलेल्या, त्यावर कुंकू हळद टाकून आदींबाबत अंधश्रद्धा किंवा भारल्या सारखा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. याकडे येणाऱे-जाणारे ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. या अशा घटनेने गावात विचित्र शंका निर्माण होत आहे. दरम्यान ग्रामस्थांनी भीती न बाळगता अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे संपर्क साधून आपले शंका निरसन करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. साफसफाई करण्यासाठी गेलो असता ‘त्या’ ठिकाणचे दृश्य पाहून मी सुद्धा अचंबित झालो. झालेला हा प्रकार निंदनीय असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. असा खोडसाळपणा केलेल्या व्यक्तीवर सबंधित विभागाकडून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजू कुकडकर यांनी केली आहे.
हिवरखेड नगर परिषद उदयास आल्यानंतरच प्रथमच मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीत न.प.ला मान्यता देण्यावरून महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात श्रेयवाद रंगला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे (शिंदे गट) नेते एकनाथ शिंदे यांनीही फोनवरून सभेला संबोधित केले होते. अशातच वंचित बहुजन आघाडीच्या माजी जि.प. अध्यक्षांनी बंडखोरी केली होती. या पहिल्याच निवडणुकीत भाजप, कांॅग्रेस, शिंदे गट, वंचितचे उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत येथील निवडणूक राहिली. आता वढळून निघालेल्या राजकीय वातावरणाचा परिणाम कोणत्या उमेदवाराच्या मतांच्या संख्येवर होईलता, हे निकालानंतर दिसून येणार आहे. हिवरखेड ग्राम पंचायत क्षेत्रात प्राथमिक, माध्यमिक शाळा, राष्ट्रीयकृत बंॅका, पोस्ट ऑफिस, कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजारपेठ, सहकारी बंॅक, खरेदी-विक्री संस्था, बीएसएनएलचे केंद्र, सरकारी आरोग्य संस्थांसह अन्य महत्त्वाची कार्यालये आहेत. गत दहा वर्षांपासून लोकसंख्याही वाढतच आहे. विधानसभेच्या अकोट मतदारसंघात हिवरखेड, तेल्हारा व अकोट या तीन नगर परिषदा येतात. गत वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना ९३ हजार ३३८ मते मिळाली होती. ते १८ हजार ८५१ मतांनी विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकावर महेश गणगणे होते. त्यांना ७४ हजार ४८७ मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे दीपक बोडखे यांना ३४ हजार १३५ मते मिळाली होती. त्यामुळे आता न.प. निवडणुकीत भाजप-आमदार, राकाँ, काँग्रेस आणि वंचितची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मंगरूळपीर येथील नगर पालिका निवडणुकीसाठी आज, २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शांततेत आणि उत्साहाने मतदान पार पडले. अध्यक्षपदासह २१ नगरसेवकांच्या निवडीसाठी झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी करून लोकशाहीच्या सणात सक्रिय सहभाग नोंदवला. नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण २९ हजार ११७ मतदार असून त्यांच्यासाठी ३१ मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली होती. अनेक केंद्रांवर सायंकाळी साडेपाच नंतरही मतदारांची गर्दी असल्याने मतदान प्रक्रिया काही काळ चालू होती. अध्यक्षपदासाठी भाजपा, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), काँग्रेस, आणि एम आय एम अशा पाच प्रमुख पक्षांमध्ये पंचरंगी लढत झाली, ज्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली होती. प्रशासनाने प्रत्येक केंद्रावर मतदारांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सुयोग्य व्यवस्था ठेवली होती. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी एक पोलीस उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक, सात सहाय्यक/उपनिरीक्षक, तसेच ८१ पोलीस हेडकॉन्स्टेबल, १५ महिला कॉन्स्टेबल, होमगार्ड, स्ट्रायकिंग फोर्स आणि एसएपी, सीएपीएफचे दोन सेक्शन असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ५ उमेदवार, तर २१ सदस्य (नगरसेवक) पदांसाठी तब्बल ८६ उमेदवार रिंगणात होते. या सर्व उमेदवारांचे भाग्य आता ईव्हीएम मशीनमध्ये कैद झाले आहे. आता या निवडणुकीचा अंतिम निकाल २१ डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.
डोक्यात खल मारुन पत्नीला संपवले:तीन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न, पोलिसांनी केली अटक
दोन दिवसांपूर्वी राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील गणपतीनगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा तिच्याच घरात रक्तबंबाळ स्थितीत मृतदेह आढळला होता. या प्रकरणात दोन दिवसांपासून मारेकऱ्याचा पोलिस शोध घेत होते. दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. २) सकाळी मारेकऱ्याला अटक केली आहे. मारेकरी हा मृतक महिलेचा पतीच निघाला असून त्याचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. पती व पत्नींमध्ये वारंवार वाद सुरू होते. याच त्रासाला कंटाळूनच खून केल्याचे पतीने पोलिसांना सांगितले. रविवारी (दि. ३०) पहाटे डोक्यात खल टाकून त्याने खुन केल्याचे समोर आले आहे. नितीन सुरेशराव इंगोले (३२, रा. अशोक कॉलनी, अर्जुनगर परिसर, अमरावती) असे अटक केलेल्या मारेकऱ्याचे नाव आहे. नितीन इंगोले हा राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातंर्गत येणाऱ्या भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या विभागात ‘प्रयोगशाळा सहायक’ या पदावर कार्यरत आहे. झोपली. त्याच मध्यरात्री नितीनने खलाने पिंकीच्या डोक्यावर हल्ला चढवला तसेच तसेच तीचे डोके भिंतीवर व पिल्लरवर मारले, यातच तीचा मृत्यू झाला. पिंकीचा खून केल्यानंतर नितीनने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी भिंतीवर काही आक्षेपार्ह मजकूर लिहीला होता. त्यासाठी पिंकीचेच लिपस्टीक त्याने वापरले. तसेच पोलिसांना पुरावा मिळू नये म्हणून त्याने घरात ज्या वस्तूला त्याचा स्पर्श झाला होता, त्या वस्तू तो सोबत घेवून गेला होता. जेणेकरुन बोटाचे ठसे पोलिसांना मिळू नयेत, हा त्याचा उद्देश असावा. त्यामध्ये त्याचे जेवणाचे ताट, ग्लास, उशी, तीचा मोबाईल अशा वस्तूंचा समावेश आहे. दिशाभूल करण्यासाठी ‘लिपस्टीक’चा मजकूर
येत्या ४ डिसेंबर रोजी पौर्णिमेच्या दिवशी सुपरमून दिसणार आहे. या दिवशी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर कमी राहील. त्यामुळे चंद्र या दिवशी मोठा व प्रकाशमान दिसेल. सरासरी पृथ्वी-चंद्र हे अंतर ३ लाख ८५ हजार कि.मी. असते. जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३ लाख ७० हजार कि.मी.च्या आत असते, त्यावेळी ‘सुपरमून’ची स्थिती येते. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तीव्रता वाढणे, वादळ यासारख्या घटना घडू शकतात. पृथ्वी वरुन आपण नेहमी चंद्राचा ५९ टक्के भाग पाहतो. चंद्रावरुन पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते, चंद्रावरुन पृथ्वीवर प्रकाशकिरण येण्यास १.३ सेकंद लागतात. चंद्राचे वय हे ४.६५ अब्ज वर्ष आहे. चंद्र हा पृथ्वीपासून दर वर्षाला ३.८ सें.मी. लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होईल व १०० वर्षांनी दिवस हा २ मिली सेकंदने मोठा होईल. पर्वत व विवरे दुर्बिनीमधून अगदी चांगल्या प्रकारे पाहता येतात. ४ डिसेंबरला संध्याकाळी दिसणारा सूपरमून खगोलप्रेमींनी आणि जिज्ञासूंनी अवश्य बघावा. हा सुपरमून अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येईल, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रविण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर यांनी दिली. खगोलप्रेमी आणि आकाश निरीक्षकांसाठी हा क्षण म्हणजे एक आनंदाचा उत्सव ठरणार आहे. अशा वेळी दुर्बिणी किंवा कॅमेऱ्याच्या सहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागावरील विवरे (क्रेटर्स) आणि रेषा (मारीआ) अधिक स्पष्टपणे दिसू शकतात. त्यामुळे सुपरमूनचा हा जादुई प्रकाशोत्सव निसर्गाचा अनोखा चमत्कार ठरणार असल्याने खगोल अभ्यासक रात्रीच्या आकाशात नजर लावून राहाणार आहेत. बॉक्स सुपरमून म्हणजे काय? पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला ‘सुपरमून’ म्हणतात. अशावेळी चंद्रबिंब चौदा पट मोठे व तीस टक्के जास्त प्रकाशित दिसते. पूर्ण चंद्र आपल्या नेहमीच्या आकारापेक्षा थोडा अधिक मोठा आणि तेजस्वी दिसतो. यावर्षी ७ ऑक्टोबर, ५ नोव्हेंबरला ‘सुपरमून’चे आकर्षक दृश्य पाहण्याची संधी मिळाली होती. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना त्याची कक्षा वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार असते. त्यामुळे काही वेळा चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो. त्यावेळी पूर्ण चंद्राच्या अवस्थेत तो सुमारे ३० टक्के तेजस्वी दिसतो. ४ डिसेंबर २०२५ च्या रात्री आकाश स्वच्छ असेल तर पूर्ण चंद्र अधिक मोठा, उजळ आणि मनमोहक स्वरूपात झळकताना दिसेल.
धम्म चळवळीला गती देण्यासाठीच बौद्ध उपासक संघाचे उपक्रम- शहारे
सामाजिक, धम्म चळवळीत विद्यार्थी युवक हा जोडून राहावा. याकरिता सातत्याने बौद्ध उपासक संघ कार्यक्रम राबवत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांचे जीवन कार्य नव पिढीपर्यंत पोहोचावे याकरिता त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित वस्तूनिष्ठ प्रश्नोत्तरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. धम्म चळवळीला गती देण्यासाठी सातत्याने बौद्ध उपासक संघ उपक्रम राबवत आहे. या माध्यमातून समाज एकत्र येत आहे. संविधान धोक्यात असल्याने, संविधानाला वाचवण्यासाठी समाजाने एकत्र येऊन लढा द्यावा लागेल, त्यासाठी सज्ज व्हावे. असे आवाहन बौद्ध उपासक संघाचे अध्यक्ष उमेश शहारे यांनी केले. बौद्ध उपासक संघ भीम टेकडी परिसरतर्फे भारतीय संविधानाच्या ७५ वर्षपूर्ती निमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरी स्पर्धा तसेच बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण समारंभ संबोधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन, भिमटेकडी परिसर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध उपासक संघ भीम टेकडी परिसराचे अध्यक्ष उमेश शहारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लेखक व सामाजिक विचारवंत मिलिंद कीर्ती आजच्या तरुणांचा रोजगार व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर मार्गदर्शन केले. विशेष अतिथी म्हणून माझी लेडी गव्हर्नर डॉ. कमल गवई उपस्थित होत्या. अतिथी म्हणून सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता गौतम धोंगडे, सेवानिवृत्त वरिष्ठ विभागीय प्रबंधक एलआयसी एस. यू. फुलझेले, पत्रकार नयन मोंढे धम्मपिठावर विराजमान होते. यावेळी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणारे सभासद प्रकाश एन. मेश्राम, महादेव बापुजी बागडे, सावित्री कृष्णराव चंद्रापुरे, शासकीय सेवेतून निवृत्त झालेले सभासद प्रविण वासनिक, सोपान चौरपगार यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यां सम्यक दिपक भालचक्र, प्रतिक्षा वासुदेव रंगारी यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. मंगेश मनोहरे यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक देण्यात आले. समारंभाचे प्रास्ताविक वर्षा गाडगे यांनी, तर संचालन दीपक डांगे यांनी केले. आभार प्रतिभा प्रधान यांनी मानले. संविधान वाचविण्यासाठी सज्ज व्हा : फुलझेले सत्तेत संविधान विरोधी समर्थक बसले असल्याने संविधानाची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. संविधान धोक्यात असून ते वाचवण्यासाठी सज्ज असणे काळाची गरज आहे. कारण देश संविधानावर चालायला पाहिजे, हे सांगायला किंवा बोलायला आज कोणीही तयार नसल्याचे प्रतिपादन संविधानाचे अभ्यासक एलआयसीचे सेवानिवृत्त वरिष्ठ विभागीय प्रबंधक एस. यु. फुलझेले यांनी केले.
संगई हायस्कूल राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर:आनंद चोरे कांस्य पदकाचा ठरला मानकरी
सीताबाई संगई हायस्कूल, अंजनगाव सुर्जी येथील वर्ग ८ ‘क’ मधील विद्यार्थी आनंद नितीन चोरेने राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत उल्लेखनीय कौशल्य दाखवत तिसरा क्रमांक पटकावून कांस्यपदक जिंकले.आनंदच्या या यशामुळे विद्यालयाचा गौरव वाढला आहे. ही शालेय राज्यस्तरीय कुराश स्पर्धा २०२५-२६ क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धा शाह मंगल कार्यालय, ता. इंदापूर, जि. पुणे येथे २७ व २८ नोव्हेंबर दरम्यान पार पडली. राज्यातील अनेक स्पर्धकांमध्ये आनंदने जिद्द, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट खेळ कौशल्याच्या जोरावर तिसरे स्थान मिळवत स्वतःची वेगळी छाप पाडली. सातत्यपूर्ण सराव, क्रीडा शिक्षक हेमंत माकोडे, विशाल भेलांडे यांचे मार्गदर्शन आणि विद्यालयाच्या प्रोत्साहनामुळे त्याने हे यश संपादन केले. आनंदच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, अविनाश संगई, उपाध्यक्ष डॉ. उल्हास संगई, सचिव विवेक संगई, सहसचिव प्रसाद संगई, अजय संगई, भरत संगई, ज्येष्ठ सदस्य अशोक संगई, मुकुंद संगई, भरत संगई, आशिष संगई, विनय संगई, अनुप संगई आणि सर्व संचालक-संचालिका मंडळ तसेच शाळेचे प्राचार्य राकेश डोणगावकर, उपमुख्याध्यापक राजेश वैद्य, पर्यवेक्षक डॉ. नीलेश डाहाळे तसेच सर्व शिक्षक- शिक्षिका व कर्मचारी वृंद या सर्वांनी खेळाडुंचे हृद्य अभिनंदन केले तसेच त्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात.
चिखलदरा नगरपालिकेत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:45 उमेदवारांची नजर 21 डिसेंबरकडे लागली
नगरपालिकेत ३३०० मतदार असून त्यापैकी ७३ टक्के मतदारांनी मंगळवारी २ रोजी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांनी उत्साह दाखवल्याने दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान झाले होते. नवीन युवकांनीही मतदानाचा हक्क बजावला. चिखलदरा ही ‘क’ दर्जाची नगरपालिका असून राज्यातील सर्वात कमी मतदार असणारी नगरपालिका आहे. चिखलदरा पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी नगरपालिका दर्जा मिळाला असून पर्यटन स्थळ असल्यामुळे या नगरपालिकेला महत्त्व आहे. त्यामुळेच संपूर्ण राज्याचे या निवडणुकीवर लक्ष लागले आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांचे मामेभाऊ अल्हाद कलोती या ठिकाणावरून नगर सेवक म्हणून अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे ही नगरपालिका निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. दुपारपर्यंत चिखलदरा नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात मतदान झाले. संपूर्ण मतदान शांततेत पार पडले. या नगरपालिकेत नगरसेवक पदासाठी एकूण ४५ तर नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये प्रामुख्याने भाजपाकडून राजेंद्रसिंह सोमवंशी, काँग्रेसकडून शेख अब्दुल शेख हैदर, प्रहारकडून सविता गावंडे तर नगरसेवक पदासाठी भाजप व काँग्रेसचे प्रत्येकी १९ उमेदवार उभे होते. मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची मामेभाऊ कलोती हे प्रभाग क्र.१० मधून अविरोध निवडून आले आहेत. प्रहारकडून ६, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून १ तर अपक्ष १ असे पक्षनिहाय उमेदवार उभे होते. तणावाचे वातावरण आहे.
येथील नगर पंचायतीच्या निवडणुकीचे मतदान पार पडल्यामुळे नगराध्यक्षांच्या सहा आणि नगरसेवकपदाच्या ७३ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात (इव्हीएम) बंद झाले आहे. न्यायालयाच्या निकालामुळे ऐनवेळी मतमोजणी लांबल्याने आता २१ डिसेंबरला येथील निकाल लागणार आहे. तोपर्यंत सर्वांनाच आपापले नगरसेवक कोण, यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. १७ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यासाठी येथील राजकीय वातावरण गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचार मोहिमांमुळे चांगलेच तापले होते. उमेदवारांकडून घरोघरी भेटी, सभा, पदयात्रा, कोपरा सभा, प्रचारफेऱ्या आदी माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात होता. अखेर प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडताच सर्व उमेदवार, कार्यकर्ते यांनी सुटकेचा श्वास घेतला असला तरी मतमोजणी पार पडेपर्यंत प्रशासनाचा ताण मात्र कायम राहणार आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले असून नगरसेवक पदासाठी तब्बल ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. शहरातील ६५ टक्क्यांहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. काही केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची रांग पाहायला मिळत होती, तर दुपारनंतर वयोवृद्ध मतदार, महिला आणि तरुण मतदारांचा सहभाग विशेषत्वाने दिसून आला. संपूर्ण शहरात मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रशासनाने सर्व मतदान केंद्रांवर नागरिकांसाठी पाणी, सावली, बसण्याची व्यवस्था आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. याशिवाय दिव्यांग आणि वृद्ध मतदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संवेदनशील भागांमध्ये अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात शांतता राखण्यासाठी गस्त वाढवण्यात आली होती. मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काटेकोर काळजी घेण्यात आली. दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी रद्द करण्यात आली असून आता मतमोजणीची प्रक्रिया २१ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे सध्या सर्व उमेदवारांची धाकधूक वाढली असून निकालाबाबत कुतूहल शिगेला पोहोचले आहे. मतदान प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नांदगाव खंडेश्वर येथील विविध मतदान केंद्रांना भेट दिली. शिवाय मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे त्या आयटीआयच्या जागेचीही पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक केंद्रावर जाऊन मतदारांची उपस्थिती आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच ी तयारी, सुरक्षा व्यवस्था तसेच इतर सुविधा याचीही पाहणी केली. यावेळी अन्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.
अंजनगाव निवडणुकीत परवानगी देण्यात भेदभाव:अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
येथील नगरपालिकेची निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना वेगवेगळ्या परवानगी मिळवण्यासाठी भेदभाव करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्षपदाचे एक उमेदवार विनीत डोंगरदिवे यांच्यासह इतर उमेदवारांनी केली आहे. या तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांसह थेट निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहे. सदर तक्रारीनुसार अंजनगाव सुर्जी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान उमेदवारांना वेगवेगळ्या परवानगी मिळविण्यासाठी प्रशासन अडसर निर्माण करीत आहेत. त्यामुळे प्रशासकीय कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. प्रचाराच्या जाहिरातींसाठी दिल्या जाणाऱ्या परवानग्या (बॅनर, दुकाने इ.) वेळेत न देता जाणूनबुजून अडविण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांवर अचानक नोटीस पाठवून यंत्रणेने मानसिक, शारीरिक ताण दिल्याचे या तक्रारदारांचे म्हणणे आहे. याशिवाय सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पक्षपातीपणा झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तक्रार संबंधित अधिकाऱ्यांसह थेट निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आल्याची माहीती प्रशासनाने दिली. कारवाईकडे लागले लक्ष संबंधित अधिकाऱ्यांच्या अशा वागण्यामुळे निवडणुकीचे स्वच्छ व निष्पक्ष वातावरण बाधित होत आहे. त्यामुळेच निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या तक्रारीनुसार प्रशासन काय कारवाई करते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
नेरपिंगळाई येथील २४ वर्षीय जवान कौशल गजानन राऊत यांचा मोर्शी नजिकच्या येरला फाट्यावर सोमवारी रात्री सकाळी एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. कौशल हे सुटीवर गावी आले होते. त्यांच्या अकस्मात निधनाने गावात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महिनाभराची सुट्टी घेऊन कुटुंबाच्या सहवासासाठी घरी आलेले वीरपुत्र कौशल हे मोर्शी या तालुक्याच्या ठिकाणी गेले होते. परत येताना सायंकाळच्या सुमारास येरला फाट्याजवळ त्यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती, की त्यांनी जागीच प्राण सोडला. कर्तव्यनिष्ठ, मनमिळाऊ आणि गावाचा अभिमान असलेल्या कौशलच्या अचानक मृत्यूमुळे परिसरातील नागरिकांतर्फे हळहळ व्यक्त होत आहे. कौशल राऊत यांना शासकीय मानवंदना देऊन लष्करी सन्मानाने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. या घटनेनंतर गावात दुःखाचे सावट दाटून आले आहे. राऊत कुटुंबावर अवेळी दुःखाचा डोंगर कोसळला असून, ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर होत आहेत. कौशल ७ वर्षांपूर्वी सीआरपीएफमध्ये दाखल झाले असून गेल्या ४ वर्षांपासून ते लेहलद्दाखच्या सीमेवर कार्यरत आहे. देशसेवा हे त्याचे ध्येय आणि गावावरील प्रेम हे त्याचे वैशिष्ट्य होते. त्याचे हे दोन्ही गुण गावकऱ्यांच्या आठवणीत घर करून राहिले आहेत. ४ वर्षांपासून लेह- लद्दाखला होते सेवेत
येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने व अपार श्रद्धेने साजरा करण्यात येत आहे. दत्त अवतारी श्री वटवृक्ष स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिरातील दत्त जयंती उत्सवास अनन्य साधारण असे महत्व आहे. श्री दत्त जयंती उत्सव गुरुवार दि. ०४ डिसेंबर रोजी मंदिरात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या दर्शनाकरीता प्रचंड गर्दी होणार आहे. परगावाहून भांडुप, घाटकोपर, मुंबई, तळेहिप्परगा, भातंबरे, कोल्हापूर, सातारा, खर्डी, गांवखडी येथून दिंडी व पालखी सोबत पायी चालत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांची निवासाची व भोजन प्रसादाची सोय मैंदर्गी- गाणगापूर रस्त्यावरील देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली. या दिवशी सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणे करीता स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार आहे. जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील. त्यांना स्वामींचा अंगारा प्रसाद मिळेल. शुक्रवार दि. ०५ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता श्रींची काकड आरती व सकाळी ११:३० वाजता महानैवेद्य आरती पुरोहित मोहनराव पूजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यानंतर मंदिर परिसरात प्रसाद वाटप करण्यात येईल. देवस्थानच्या मैंदर्गी- गाणगापूर रोडवरील भक्त निवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी परगावाहून भांडुप, घाटकोपर, मुंबई, तळेहिप्परगा, भातंबरे, कोल्हापूर, सातारा, खर्डी, गांवखडी येथून दिंडी व पालखी सोबत पायी चालत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांची निवासाची व भोजन प्रसादाची सोय मैंदर्गी- गाणगापूर रस्त्यावरील देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली आहे. दत्तजयंती दिवशी पहाटे ४ वाजता पुरोहित मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते श्रींची काकड आरती व सकाळी ११:३० वाजता नैवेद्य आरती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. भोजन महाप्रसाद दुपारी १२ ते ३ या वेळेत देण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री ९:३० या वेळेत शहरातून श्रींचा पालखी सोहळा मिरवणुक भजन, दिंड्या व वाद्यासह पार पडणार आहे. श्रींची पालखी मिरवणूक रात्री ९:३० वाजता मंदिरात आल्यानंतर देवस्थानच्या वतीने शिरा प्रसाद वाटप होवून श्री दत्त जयंती उत्सवाचा सांगता समारंभ होईल. मंदिरात नित्य नियमाने दर गुरुवारी मंदिर परिसरातच संपन्न होणार जास्तीत- जास्त भाविकांनी दत्त जन्म सोहळा, पालखी सोहळ्यास उपस्थित राहुन श्रींच्या दर्शनाचा, पालखी सोहळा दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे. मंदिरात ०४ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते ५ :३० या वेळेत देवस्थानच्या विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्त्या खाली येथील सत्संग महिला भजनी मंडळाचे दत्त जन्म आख्यान, वाचन व भजन करुन सायंकाळी ६ वाजता अनेक स्वामी भक्तांच्या उपस्थितीत गुलाल पुष्प वाहून श्री दत्त जन्म सोहळा व पाळणा कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात होईल. यावेळी उपस्थित सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने सुंठवडा प्रसाद वाटप करण्यात येईल. यानंतर मंदिरात नित्य नियमाने होणारी शेजारती व दर गुरुवारी मंदिर परिसरातच संपन्न होणारा श्रींचा पालखी सोहळा पार पडणार. भक्तांसाठी निवास व भोजनाची सोय
शेतकऱ्यांच्या मुलांनी उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन चमकावे:लेखक डॉ. विकास शहा यांचे प्रतिपादन
संस्कार, संस्कृती आणि समाजोन्नतीचा ध्यास घेत आयुष्यभर कार्य करणारे समाजभूषण नानासाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शेतकऱ्यांच्या मुलांनी उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन चमकावे, असे प्रतिपादन डॉ. विकास शहा यांनी केले. यावेळी प्रमुख व्याख्याते, लेखक व नामवंत वक्ते डॉ. विकास शहा यांनी नानासाहेबांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा विविध अंगांनी वेध घेतला. एस. एन. डी. इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल, नातेपुते येथे आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. समाजभूषण नानासाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी डॉ. विकास शहा म्हणाले की, घरामध्ये विचारांचा, कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा माणूस असावा आणि त्या व्यक्तीनेच घरातील संस्कार घडवावेत, हा आदर्श नानासाहेबांनी आयुष्यभर जगला. संस्कृती, संस्कार आणि समाजाला पुढे घेऊन जाण्याचा विचार नानासाहेबांच्या प्रत्येक कामातून स्पष्ट जाणवतो, असे नमूद केले. नातेपुतेचा शेतकरी सदन व्हावा, शेतकऱ्यांच्या मुलांनी उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन चमकावे, या ध्येयानेच नानासाहेबांनी या माळरान भागात कामाची सुरुवात केली असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, धैर्यशील देशमुख, नाथाजीराव देशमुख, अमरशील देशमुख, हेमंत देशमुख, भैय्यासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका पानसरे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य संदीप पानसरे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य शकूर पटेल यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक, पदाधिकारी उपस्थित होते.
येथील बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी येथे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे जागतिक एड्स दिनानिमित्त सोमवारी (दि.१) जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी युवकांनी वैज्ञानिक दृष्टीकोन पसरवला तर एड्समुक्त समाजाचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन प्रा. ए. व्ही. पवार यांनी केले. यावेळी युवकांच्या पुढाकारानेच एड्समुक्त समाज उभारता येऊ शकतो हा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. ए. व्ही. पवार उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. एम. ए. ढगे यांनी केले. प्रा. पवार म्हणाले एड्स विषयीचे गैरसमज दूर करणे हीच खरी जनजागृती असून हा आजार लपवण्याचा विषय नाही तर माहिती, जागरूकता आणि योग्य निर्णय क्षमता यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात. युवकांनी समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन पसरवला तर एड्समुक्त समाजाचे स्वप्न साकार होईल. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य करंडे यांनी आरोग्य जागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले युवक हे समाजाचे आरसे आहेत. त्यांच्याकडे ज्ञान, ऊर्जा आणि विचारशक्ती आहे. प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी व योग्य माहितीचे प्रसारण युवकांनी केल्यास एड्स विरोधी लढा अधिक प्रभावी होईल. एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थी समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात.
येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मधील बूथवर मतदान यंत्रावर भाजपच्या चिन्हाचे बटण दाबले जात नसल्याचा आक्षेप घेत त्या प्रभागातील भाजपच्या उमेदवार अंकिता पाटोळे यांचे पती तथा निवडणूक प्रतिनिधी अंबादास पाटोळे यांनी इव्हीएम फोडल्याच्या आरोपातून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रभाग क्रमांक ७ मधील अंकिता पाटोळे यांचे उमेदवार प्रतिनिधी अंबादास पाटोळे दुपारी वृद्धेस मतदानासाठी बूथ क्रमांक ३ मध्ये घेऊन गेले. मतदान यंत्रातील भाजपचे चिन्ह असणारे बटण दाबले जात नाही, या कारणातून त्यांनी हे मतदान यंत्र जमिनीवर आदळले, यामुळे मतदान प्रक्रिया एक तास खोळंबली. निवडणूक प्रशासनाने दुसरे यंत्र मागवून मतदान सुरू केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (श. प. ) उमेदवार क्रांतिसिंह माने पाटील व राष्ट्रवादी (अ. प. ) नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड. देवयानी रास्ते यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करत वेळ वाढण्याची मागणी केली. प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत अकलूज येथे इव्हीएमचे बटण दाबल्यानंतर बीप आवाज येत नसल्याच्या आक्षेपातून कार्यकत्याने मशीन आपटून फोडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. या घटनेने शांततेत चाललेल्या मतदान प्रक्रियेला गालबोट लागले. सुमारे तासभर केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता. मोहोळ, अक्कलकोट, सांगोला येथील काही मतदान केंद्रांवर इव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया रोखली गेली. पंढरपुरात उर्दू शाळा केंद्रावर प्रचार केला जात असल्यावरुन तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेत्यांची पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. मतमोजणी प्रक्रिया २१ रोजी होणार असल्याचे वृत्त धडकताच जनतेच्या कौलाची धगधग १८ दिवस वाढली आहे. बहुतांश केंद्रांवर सायंकाळी रांगा लागल्या होत्या. चुरशीच्या मतदानाचा टक्का गत निवडणुकीच्या तुलनेत वाढला. सोलापूर जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२) मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. सकाळच्या सत्रातच अक्कलकोट, मोहोळ व अकलूज, सांगोला येथील काही मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. सुमारे तासभर मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली. सांगोला येथील तीन मतदान केंद्रांवरील मशीन बदलण्याची नामुष्की निवडणूक यंत्रणेवर आली. अक्कलकोट, मोहोळ येथे यंत्रातील दुरुस्ती करुन मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. कुर्डुवाडीत साठे चौक परिसरात हाणामारीची घटना घडल्याचे सांगण्यात आले. येथे अनेक केंद्रावर मंडप नसल्याने मतदार उन्हातच रांगेत उभे होते. रात्री पुरेशी दिवाबत्तीची सोय नसल्याने अंधारातच रांगा लागल्या होत्या. सांगोला येथे तीन बॅलेट यंत्र बदलल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. धनगर गल्ली, भोपळे रोड जि.प. शाळेसह विद्या मंदिर प्रशालेत यंत्रात बिघाड झाल्याने केंद्रात मतदानासाठी रांगेत प्रतीक्षा करावी लागली. अक्कलकोट मधील उर्दू शाळेतील केंद्रात सकाळीच मतदान यंत्रात बिघाड निर्माण झाला. सुमारे तासभर यंत्र दुरुस्तीला लागला. भाजप-शिंदे सेनेतील लढाईत निधी खेचण्याच्या ताकदीचे प्रदर्शन रंगले. जगताप गटाने प्रचार सभेतून एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांना प्रचारसभेत व्हिडिओ कॉल करुन एमआयडीसी, मूलभूत प्रश्नांसाठी निधी मिळवण्याचे आश्वासन घेतले. पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन लावला. निधी खेचण्याच्या साठमारीची रंगत होती. तीर्थक्षेत्र विकासासह मूलभूत सुविधांचा अभाव हा पंढरीतील राजकारणाचा प्रभावी मुद्दा राहिला. प्रणिता भालके यांच्या लढाऊ प्रतिमेचा उपयोग करत महिलांचे प्रश्न, नदी प्रदूषण, पाणी, रस्त्यांवर राळ उडवली. मंदिर परिसरात भूसंपादन कळीचा मुद्दा राहिला. विकसित भागात निधी खेचण्याची संधी यावरच सत्ताधारी प्रचारात होते. त्यामुळे निवडणूक निकालाकडे लक्ष लागले आहे. केंद्रावर नातवांनी आजोबाला मतदानासाठी उचलून आणले. अक्कलकोट येथील मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. पुरेशा पिण्याच्या पाण्याचा मुद्दा बार्शीकरांच्या दृष्टीने महत्वाचा राहिला. आरोग्य सुविधांचा अभाव, भ्रष्टाचार, मूलभूत प्रश्नांवर राळ उडवण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. सत्ताधारी गटाने आक्रमक शैलीचा फटका लक्षात घेऊन केलेल्या कामांवर व निधी मिळवण्याच्या संधी. शहराचे बदलेले रुपडे प्रचारात फोकस करण्यावर भर दिल्याने निवडणुकीत रंगत आली. शेकापचा गड असल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेकापच्या नेत्याला रात्रीतून भाजपच्या तिकिटावर उतरवल्याची चर्चा रंगली. सत्तेचा वारू आपल्या हाती राखण्यासाठी मित्रपक्षाचे खच्चीकरण चर्चेचा विषय ठरला. पोलिस छाप्याच्या क्लुप्ती इथल्या राजकारणाचा नूरच बदलला. स्थानिक प्रश्नांपेक्षा भाजप-सेना मित्र पक्ष अस्मितेवर भर राहिला. मत विभागणीचे आव्हान राजकीय पक्षांसाठी आव्हानात्मक राहिले. ९१७ मालमत्ताधारकांच्या अ वर्गचा, रेल्वे वर्कशॉप प्रचार सभेत केंद्रस्थानी होते. एमआयडीसी, विकासासाठी पुरेसा निधी आणण्याची ताकद भाजपकडे असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न झाला. सत्ताधारी ठाकरे सेनेला रखडलेल्या विकासकामांच्या रोषाचा सामना करावा लागला. सांगोल्यात विवाहिता लग्न लागल्यानंतर मतदानाला आली. आधी लग्न लोकशाहीचे हा संदेश त्याने कृतीतून दिला आहे. नवरदेवही मतदानासाठी आला. दोघांनीही लोकशाहीतील मतदानाचे कर्तव्य पार पाडले.
नव्या पिढीला समृद्ध होण्यासाठी चांगल्या विचारांची गरज आहे. पण सध्या फक्त संदेश व उपदेश देण्याचे स्तोम माजत आहे. प्रत्यक्षात भरपूर कौशल्य असलेल्या नव्या पिढीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे. कथाकथन हे जीवनाला आनंद देणारे आहे. म्हणून कथाकथन स्पर्धा होणे आवश्यक आहे. गंभीर, आनंदी, विनोदी, स्वानुभवावर लवचिक कथा सांगत रहा. सध्याच्या एआय तंत्रज्ञान युगातही सारडा महाविद्यालयाच्या कथाश्री स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद आहे. , असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी केले. पेमराज सारडा महाविद्यालयाच्यावतीने शहरातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या ‘कथाश्री करंडक' या शालेय कथाकथन स्पर्धेचे परितोषिक वितरण ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक होते. यावेळी अजित बोरा, डॉ.पारस कोठारी, प्रा.ज्योती कुलकर्णी, दिलीप शहा, जगदीश झालानी, प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात प्रा. ऋतुजा कुलकर्णी यांच्या नारदीय कीर्तनाने झाली. अध्यक्ष शिरीष मोडक म्हणाले, मोबाइल व संगणकाच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा पुस्तक व कथा यांकडे वळवण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरली आहे. या स्पर्धेला मिलालेला प्रतिसाद आशादायक आहे. सारडा महाविद्यालय हे उपक्रमशील महाविद्यालय आहे. मागच्या वर्षी पुस्तक दिंडी काढून कथाश्री स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. तर यावेळी नारदीय कीर्तन सादर करुन महाविद्यालयाने आपले वेगळेपण पुन्हा एकदा दाखवून दिल्याचे मोडक यांनी यावेळी सांगितले. स्पर्धेचे सहसंयोजक अविनाश झरेकर यांनी स्पर्धेची माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्रबंधक अशोक असेरी, उपप्राचार्य गिरीश पाखरे, पर्यवेक्षक राजू रिक्कल, सुजित कुमावत उपस्थित होते. प्रा.प्रसाद बेडेकर यांनी निकाल वाचन केले तर स्पर्धेच्या संयोजिका प्रा.अर्चना कुलकर्णी यांनी आभार मानले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक आर्या लड्डा (रामकृष्ण एज्युकेशन इंग्लिश स्कूल), द्वितीय समृद्धी गोसावी (प्रियदर्शनी पब्लिक स्कूल भिंगार) तृतीय विभागून ओश्मी तवर (रामकृष्ण एज्युकेशन इंग्लिश स्कूल) व कांचन नन्नवरे (गुगळे हायस्कूल) उत्तेजनार्थ गौरी साठ्ये, राघव व्हरसाळे, स्वरांजली साळवे व मुग्ध देवचके, विशेष सन्मान रेणावीकर माध्यमिक विद्यालय. विजेत्यांना सन्मानपत्र व बक्षिसाची रोख रक्कम उपस्थितांच्या हस्ते देण्यात आली. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन शहरातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी सारडा महाविद्यालयात या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विविध विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कथाकथनाच्या माध्यमातून कौशल्यांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.
येथील उपजिल्हा रुग्णालयात एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ६ हजार ५८५ रुग्णांची तपासणी आली. यामध्ये आठ पुरुष व सात महिला एचआयव्ही संसर्गित आढळले. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक राज्यांमध्ये राज्य एड्स नियंत्रण संस्थांची निर्मिती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग स्थापन करण्यात आला आहे. या विभागांतर्गत प्रत्येक जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मोफत एचआयव्ही तपासणी करिता एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर येथे सन २००७ पासून मोफत एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राची स्थापना महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागांअंतर्गत करण्यात आली आहे. या विभागामध्ये तपासणी केली जाते. यामध्ये एचआयव्ही संसर्गित आढळून आलेल्या रुग्णांना मोफत औषधोपचार सुरू केले जातात. या एचआयव्ही संसर्गित रुग्णांना दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र देऊन त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजना सुरू करण्याकरता सर्व मार्गदर्शन करत या योजनेचा लाभ मिळवून दिला जातो. एचआयव्ही संसर्गित गरोदर मातांकडून तिच्या होणाऱ्या बाळाला या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी आणि उपाययोजना केली जाते. आजपर्यंत ६० पेक्षा जास्त बालकांना एचआयव्ही संसर्गांपासून रोखण्यात यश मिळाले आहे. एचआयव्ही या आजाराबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे. युवक युवतींमध्ये जनजागृती व्हावी किशोरवयीन मुला-मुलींमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे शहरातील महाविद्यालयांमध्ये रेड रिबन क्लब स्थापन करण्यात आले आहेत. तसेच एचआयव्ही बाधित तरुण-तरुणींचे विवाह देखील केले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून सातत्याने एचआयव्हीबाबत नागरिकांत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांमुळे एचआयव्हीचे प्रमाण कमी होत चालले आहे. श्रीरामपूर केंद्राला मिळाले ५ स्टार मानांकन केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामार्फत राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या अंतर्गत क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत नगर जिल्ह्यातली पहिले आयसीटीसी सेंटर अर्थातच फाईव्ह स्टार मानांकन एकात्मिक सल्ला आणि चाचणी केंद्र श्रीरामपूरला मिळालेला आहे.
कुठल्याही संस्थेत नेहमी समुहाने काम होत असते- संजय देशपांडे
४० वर्षांच्या सेवा काळात अनेकवेळी रात्री उशिरापर्यंत काम करावे लागले. मात्र कुठलेही काम हे नेहमी समुहाने व एकजुटीने होत असते, असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडिया च्या चौपाटी कारंजा शाखेतून स्पेशल असोसिएट पदावरून नुकतेच निवृत्त झालेले संजय देशपांडे यांनी केले. सेवापूर्ती निमित्त एसबीआयच्या चौपाटी कारंजा शाखेत शाखा प्रबंधक आशिष वट्टमवार यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर फिल्ड अधिकारी प्रगती बर्डे, नमिता देशपांडे आदी उपस्थित होते. देशपांडे यांनी बँकेतील सेवा काळाच्या या कालावधीत अनेक आठवणी मिळाल्या त्या कधीही विसरता येण्या सारख्या नाहीत. नोकरीत आई वडिलांचे आशीर्वाद व पत्नीची साथ यामुळे मला हा सगळा प्रवास पुर्ण करता आला. बँके मुळेच माझा उत्कर्ष झाला तिचे ऋण कधीही विसरता येणार नाहीत, असे सांगितले. वट्टमवार म्हणाले, आयुष्यात दोन इनिंग असतात एक सेवेत असताना व दुसरी सेवा पश्चात असे सांगत देशपांडे यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. ४० वर्षांच्या सेवेत त्यांनी कोपरगाव, श्रीगोंदा, लोणी व्यंकनाथ, चास, केडगाव, चौपाटी कारंजा या शाखेत काम केले आहे.
शहरात तापमानाचा पारा घसरला असून कडाक्याची थंडी पडू लागली आहे. अशा कडाक्याच्या थंडीत पांघरूण न घेता बाहेर रस्त्यावर झोपलेल्या गरजू व्यक्तींना स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरात सुमारे ५० जणांना ब्लॅंकेट वाटप केले. शहरात मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडू लागली आहे. शहराचा पारा ९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे सायंकाळी सात वाजल्यानंतर दुकाने बंद होऊ लागली आहेत. मात्र, या परिस्थितीत निराधार, अनाथ, गरीब लोक रस्त्याच्या कडेला, दुकानाबाहेर कुडकुडत झोपत आहेत. तर काही व्यक्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक एवढेच नव्हे, तर सार्वजनिक चौकात जागा मिळेल त्या ठिकाणी रात्रीची झोप घेऊ लागले आहेत. दरम्यान, यांची कडाक्याच्या थंडीत होणारी स्थिती लक्षात घेऊन स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी रात्रीच्या वेळी शहरातील सावेडी, पाईपलाईन रोड, दिल्लीगेट, मार्केट यार्ड, माळीवाडा, सार्वजनिक ठिकाणी तसेच बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे जाऊन कडाक्याच्या थंडीत झोपलेल्या गरजूंच्या अंगावर ऊबदार चादर पांघरून त्यांना मायेची ऊब दिली. शहरात सुमारे ५० पेक्षा अधिक गरजूंना ऊबदार चादर वाटप करण्यात आली. यावेळी सचिन पेंडुरकर, संकेत शेलार, आयुष लालबोन्द्रे, अंकुश गोत्राळ उपस्थित होते. गरजूंच्या चेहऱ्यावरील हास्याने समाधान कडाक्याच्या थंडीच्या काळात उबदार पांघरूण मिळाल्यानंतर गरजूंच्या चेहऱ्यावरील हास्य समाधान देऊन गेल्याचं स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सांगितले. गरजूंना न बोलता व त्यांची झोप न मोडता त्यांच्या अंगावर हे उबदार ब्लँकेट टाकण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याचे नागरिकांकडून कौतूक केले जात आहे.
बिबट नियंत्रणास मंजुरी द्या- खा. नीलेश लंके, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना दिले पत्र
नाशिक विभागात वाढता मानव विरूद्ध बिबट संघर्ष धोकादायक टप्प्यावर आहे. महाराष्ट्र शासनाने वैज्ञानिक पद्धतीने बिबटसंख्या नियंत्रण प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला तातडीने ‘मूलतत्त्व मंजुरी’ द्यावी, या मागणीचे पत्र, खा. निलेश लंके यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना पाठवले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासह अनेक भागात जंगलाऐवजी लोकवस्तीत बिबट्यांचा वावर वाढला आहे. शेती, मानवी वस्त्या व बागायती पट्ट्यात बिबट्यांचे वारंवार दर्शन होत आहे. त्यामुळे महिला, मजूर, शेतकरी आणि लहान मुलांवर गंभीर जीविताचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांत मृत्यू, जखमी होणे आणि पाळीव जनावरांच्या हल्ल्यांतही मोठी वाढ झाल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या अहवालात स्पष्ट आहे. परंपरागत उपाय निष्फळ ठरत असल्याने शासनाने वैज्ञानिक उपाय सुचविले आहेत. नर व मादी बिबट्यांवर सूक्ष्मछेदनाद्वारे कायमस्वरूपी जनन नियंत्रण, तसेच काही मादींवर औषधाधारित गर्भनिरोधकांची चाचणी अशा उपायांचे परीक्षण भारतीय वन्यजीव संस्था करणार आहे. संघर्षाची गंभीरता लक्षात घेता मंजुरीस विलंब करू नये. वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या कलमानुसार सविस्तर कार्ययोजनेला परवानगी द्यावी, असे लंके यांनी पत्रात स्पष्ट केले. ग्रामीण भागातील मजूर, महिला, मुले आणि जनावरांचे संरक्षण हा तातडीचा प्रश्न बनला आहे. केंद्राचा त्वरित हस्तक्षेप अपरिहार्य असल्याचे लंके यांनी नमूद केले.
मालेगाव शहरातील नवीन बसस्थानकाच्या नूतन इमारत भूमिपूजन सोहळ्यास ५ उलटले असून अद्याप बांधकाम पायाभरणीच्याच प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे सदर बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण होईल, अशी दुर्मिळही आशा दिसत नाही. कासवगतीने सुरू असलेल्या या बांधकामावर कोणाचाही वचक नसल्याचे सद्या स्थितीवरून स्पष्टपणे निदर्शनास येत आहे. त्यामुळे दररोज येणाऱ्या प्रवाशांना दीर्घकाळ हाल सोसावे लागणार आहेत. बसस्थानक नूतन इमारत बांधकाम भूमिपूजन सोहळा यावर्षी २६ जुलै रोजी राजकीय, शासकीय मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी बसस्थानक कर्मचारी प्रवाशांसमक्ष उपस्थितीत ठेकेदाराला बांधकाम दीड वर्षात पूर्ण करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र हे काम अतिशय कासव पावलाने सुरू आहे. पाच महिने उलटले तरी बांधकाम पायाभरणीच्या प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे हे काम दीर्घकाळ चालणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सदर सार्वजनिक ठिकाणी २४ तास लोकांच्या वर्दळीचे आहे. मालेगाव शहरातील प्रवाशांसह इतर जिल्ह्यातील, तालुक्यातीलही अनेक प्रवासी येथे येत असतात. यामुळे साहजिकच शहरातील प्रशासकीय यंत्रणेचा बांधकातील नियोजनाचा अभाव असल्याचा मुद्दा चर्चेत येत आहे. बस स्थानकात तोकडी जागा असल्याने येणाऱ्या बसेसला पार्किंगची अडचण होत आहे. जागा मिळेल तिकडे बस उभ्या केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना देखील इच्छित स्थळाची बस शोधण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. त्यात प्रवासी शेड पत्री असून कमी लोकसंख्या धारण क्षमता असणारे असल्याने गर्दी वाढून दाटीवाटी होते. तसेच बससचालक, वाहक यांचे विश्रांती गृहही व्यवस्थित नसल्याने याचा परिणाम वाहक यांच्या तब्बेतीवर व मानसिकतेवर होतो. कामाची गती बघता वेळेत काम पूर्ण होईल, अशी दुर्मिळ आशा तर आहेच. मात्र सदर काम लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी संबंधित प्रशासनाने वचक ठेवत काम लवकर मार्गी लावून घेणे गरजेचे आहे. सध्या प्राथमिक पायाभरणी टप्प्यात सुरू असलेले बसस्थानकाचे बांधकाम. कामाची गती वाढवावी बसस्थानक नूतन इमारत बांधकामाची गत मालेगाव उड्डाणपूलासारखी व्हायला नको. बस स्थानक मोठे सार्वजनिक ठिकाण आहे. सुरू असलेल्या कामाची गती चिंताजनक आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास सोसावा लागणार आहे, ही बाब शासनाने लक्षात घ्यावी. - निखिल पवार, सामाजिक कार्यकर्ते
थेटाळे रस्त्यावर अपघात:उगावच्या युवकाचा मृत्यू, वाहनचालक घटनास्थळावरून फरार
निफाड तालुक्यातील थेटाळे - लासलगाव रस्त्यावर मंगळवारी (दि. २) दुपारच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत उगाव येथील अनिकेत गोरख पानगव्हाणे (१७) या युवकाचा मृत्यू झाला. अनिकेत हा दुचाकीने लासलगावकडून उगावकडे जात होता. यावेळी थेटाळे येथील चौफुलीजवळ त्यास अज्ञात वाहनाने धडक दिली. यात डोक्यावरून चाक गेल्याने अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. लासलगाव पोलिस ठाण्याचे पोलिस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लासलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, उगाव अवजड वाहतुकीची वाहने अतिशय भरधाव वेगात जातात. विशेषत: खडी, दगड, माती, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नंबर नमूद नसतो. त्यामुळे अपघात करून पलायन करण्याचे प्रकार घडत आहेत. यावर पोलिस कठोर उपाययोजना करण्याची मागणी उगाव भागातील नागरिकांनी केली आहे. अनिकेत हा अकरावीत शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण, एक मोठा भाऊ असा परिवार आहे. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या अनिकेतचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याचे महाविद्यालयीन मित्र व गावकरी अंत्ययात्रेवेळी भाऊक झाले होते.
एकाच वेळी दीडशे नागरिक मिरवणुकीने प्रभाग क्रमांक दोनच्या म्हाडा कॉलनी येथील मतदान केंद्रावर आल्याने नगरसेवक पदाच्या दोन उमेदवारांत शाब्दिक चकमक झाली. एका पक्षाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराने सांगितले की, गेली पंधरा वर्षे मी व ‘ती' व्यक्ती एकाच पक्षाकडून नगरसेवक राहिलेलो आहोत. इंदिरानगर झोपडपट्टीतील मतदारांना आमिष दाखवून व धाक दाखवून ते एकत्र मतदानासाठी घेऊन येतात. यावेळी ते दुसऱ्या पक्षाकडून प्रभाग क्रमांक दोनमधून निवडणूक लढवत आहेत. याही वेळी इंदिरानगर येथील दीडशे नागरिकांना घेऊन ते म्हाडा कॉलनी येथील मतदान केंद्रावर मंगळवारी (दि. २) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास आले होते. यावेळी मी मतदारांना तुम्ही अशा भूलथापांना, आमिषाला बळी पडू नका, अन्यथा तुमचे घर नावावर होऊ देणार नाही, असे बोललो, पण या संवादाचा काही भाग कापून तुमचे घर नावावर होऊ देणार नाही,’ एवढ्याच वाक्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. टीम दिव्य मराठी | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६ नगर परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी दिवसभर चुरशीचे मतदान झाले. वैजापूरसह काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत रांगा लावून मतदारांनी मतदान केले. तर, पैठणला काही वेळ १० ईव्हीएम मशीन बंद पडल्या होत्या. वेळीच या मशिन बदलण्यात आल्या. याचा फारसा काही मतदानावर परिणाम झाला नाही. पैठणला दुपारी तीन वाजेपर्यंत ५४ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. त्यानंतर अनेक भागांतील मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही ठिकाणी किरकोळ वाद झाले. १० ईव्हीएमचे बटण अचानक बंद पडल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा आला. मात्र, तांत्रिक पथकांनी मशीन तातडीने दुरुस्त करून मतदान पुन्हा सुरू केले, अशी माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली. ४४ बूथपैकी प्रभाग ८ मधील बूथ क्रमांक ४ वरील मशीन अर्धा तास बंद राहिली. प्रभाग ११, २, ३ आणि ९ मधील मशीनही बंद पडली. त्यामुळे काही ठिकाणी मतदार नाराज झाले. तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी आणि अधिकाऱ्यांनी समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. मात्र, रांगेत उभ्या असलेल्या सर्व मतदारांना मतदानाची संधी देण्यात आली. पंचायत समितीमधील बूथ क्रमांक २ येथे उमेदवारांच्या नेत्यांमध्ये किरकोळ वाद झाला. पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी तत्काळ हस्तक्षेप करून नेत्यांना मतदान केंद्राबाहेर काढले. नगराध्यक्षपदासाठी ६ उमेदवार आणि नगरसेवकपदासाठी १०१ उमेदवार रिंगणात होते. नगरसेवकपदासाठी एकूण ११५ उमेदवार उभे होते. मात्र, चार प्रभागांतील निवडणूक २० डिसेंबरला होणार असल्याने आज १०१ उमेदवारांसाठी मतदान झाले. प्रतिनिधी | वैजापूर नगर परिषदेच्या बारा प्रभागांतील २३ जागा व नगराध्यक्षपदासाठी मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत सकाळी साडेसात ते साडेतीन वाजेपर्यंत अकरा हजार ३०२ पुरुष व अकरा हजार ७३८ स्त्री अशा सुमारे २३ हजार ४० मतदारांनी म्हणजेच ५४. ४२ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अनेक मतदान केंद्रांवर रात्री सात वाजेनंतरही मतदान सुरु होते. शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील दोन्ही बूथवर रात्री ८ पर्यंत मतदान सुरू होते. साधारणपणे ७३.३० टक्के मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र सुरुवातीचे दोन तास वगळता दिवसभर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. त्यामुळे बहुतेक सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा बघायला मिळाल्या. बाजार समिती येथील मतदान केंद्र, दर्गा बेस, मौलाना आझाद शाळा, लोकमान्य टिळक शाळा आदींसह अनेक मतदान केंद्र गर्दीने फुलले होते. वैजापुरात २१ हजार ३४३ पुरुष व २० हजार ९९१ महिला असे ४२ हजार ३३४ मतदार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या तीन व नगरसेवक पदासाठी ७३ अशा ७६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. या शिवाय इतरही ठिकाणी निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या सर्वच उमेदवारांचा भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. गंगापुरात मतदान केंद्र क्र. २/३ वर सकाळी ९.१५ ते ९.३० दरम्यान ईव्हीएम मशीन बंद पडले होते. ते बदलून दुसरे बसवल्यानंतर मतदान पूर्ववत सुरू झाले. याशिवाय काही मतदान केंद्रांवर ईव्हीएमचे बटन दबत नसल्याने मतदानास अडचणी येत असल्याच्या तक्रारी काही मतदारांनी केल्या होत्या. आता भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. नेमका निकाल कुणाच्या बाजून लागतो, याकडे मतदारांसह उमेदवारांचे लक्ष लागले आहे. दिवसभर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. यावेळेस अनेक ठिकाणी मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून आले.
नॅशनल इंग्लिश स्कूल अजिंठा येथे कॅन्टीन डे मोठ्या उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांनी पिझ्झा, बर्गर, पानपुरी, शेंगदाण्याचे लाडू, समोसा, चहा, भेळ, इडली डोसा यांसारख्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले. व्यावहारिक ज्ञानाचे धडे घेतले. गुलाब जामुन, वेज रोल, चणा मसाला, मिसळ, पुरी भाजी आणि विविध मिठाईंचाही समावेश होता. चविष्ट पदार्थांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. मित्रांसोबत एकत्र येऊन त्यांनी खाद्यपदार्थांचा आनंद घेतला. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष शेख इकबाल अहेमद, सचिव शेख जिया उल हक, डायरेक्टर शेख शम्स उल हक, शेख मोइन उल हक, संजय जाधव, शेख सलीम, डॉ. नसिर अहेमद, साबेर खान, एजाझ कुरेशी, शेख हमजा, शेख सरफराज, अब्दुल मतिन, मोमीन जमील, सय्यद नासेर, सय्यद अन्वर, प्राचार्य शेख तलहा अहेमद, मुख्याध्यापक अन्सारी जहिर अहेमद, शेख अफसर, शेख खुसरो, शेख युनूस, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खाद्यप्रेमी, फूड व्लॉगर तसेच खवैय्यांनी मोठ्या संख्येने या मेजवाणीचा आनंद घेत विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या खाद्यपदार्थांबद्दल माहिती देत त्यांची पाककृती व वैशिष्ट्ये देखिल समजावून सांगितली. शालेय विद्यार्थ्यांच्या या कॅंटिन डे ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये देखिल मोठा उत्साह बघावयास मिळाला. संस्थेचे अध्यक्ष इकबाल अहेमद यांनी सांगितले, कॅन्टीन डेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सहयोग, एकता आणि आनंदाची भावना वाढवणे हा होता. आवडत्या खाद्यपदार्थांची चव चाखण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
पारंपरिक शेतीला फाटा देत दोन भावांच्या मेहनतीला यश
सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी परिसरात सुरुवातीपासून परतीच्या पावसाने थैमान घातले. अशा हवामानातही गावातील तरुण शेतकरी विष्णू भिमराव दौड आणि सदाशिवाय भिमराव दौड यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत अद्रक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गट क्रमांक ४२ मधील एक एकर शेतीत अद्रक लागवड केली. योग्य नियोजन, वेळेवर फवारणी, खतांचा डोस आणि पाण्याचा निचरा यामुळे त्यांचे पीक चांगले बहरले आहे. तालुक्यात अनेक भागांत सततच्या पावसामुळे अद्रक सडून गेली. अनेक शेतकऱ्यांचे प्लॉट खराब झाले. मात्र दौड बंधूंनी वेळेवर उपाययोजना केल्याने त्यांचे पीक वाचले. एक एकर अद्रक शेतीचा खर्च सुमारे एक ते दीड लाख रुपये येतो. तरीही उत्पादन हमखास मिळते. यंदा त्यांच्या प्लॉटवर उत्पादन सरासरीपेक्षा जास्त निघण्याची शक्यता आहे. विष्णू दौड यांनी सांगितले, अतिवृष्टीतही अद्रक वाचवण्यासाठी वेळेत फवारणी केली. खतांचे डोस दिले. बेडमधून पाणी बाहेर काढले. त्यामुळे पीक चांगले बहरले आहे. बाजारात चांगले भाव मिळाले तर मेहनतीचे सोनं होईल. या दोघांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली आहे. बाजारभाव चांगला मिळाल्यास उत्पन्नही चांगले मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमधील एक महत्त्वाचे कलाकार म्हणजेच इंग्रज अधिकारी कॅप्टन रॉबर्ट गिल यांचे पणतू डॉ. केनेथ डुकाटेल आणि त्यांची पत्नी कॅथरीना सुयकेन्स यांनी अजिंठा लेणीला भेट दिली. लेणी पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यांच्या पंजोबांनी येथे काम केलं, याचा त्यांना अभिमान वाटला.त्यांनी अजिंठा येथील गिल टॉपलाही भेट दिली. डॉ. डुकाटेल म्हणाले, आज येथे येऊन धन्य झालो. हा एक असा खजिना आहे, जो आपण जपून ठेवला पाहिजे. अजिंठा लेणीच्या सौंदर्याने ते भारावून गेले. आज इथे येणं सोपं आहे, पण आमचे पंजोबा त्या काळात इथे कसे आले असतील, राहिले असतील, याचं आश्चर्य वाटतं, असे त्यांनी सांगितले. त्यांनी अनेक वर्षे लेणीवर काम केलं. डॉ. डुकाटेल आणि कॅथरीना सध्या हनिमूनसाठी भारतात आले आहेत. कॅथरीनाच्या इच्छेने त्यांनी अजिंठा लेणीला भेट दिली. त्यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाचे आभार मानले. तुम्ही आमचं ज्या पद्धतीने स्वागत केलं, त्याबद्दल धन्यवाद. माझ्या हनिमून ट्रिपमध्ये या अद्भुत स्थळाला भेट देता आली, याचा मला आनंद आहे, असं त्यांनी सांगितलं. या वेळी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने अजिंठा लेणीचे प्रमुख अधिकारी मनोज मीराबाई प्रकाश पवार आणि संरक्षण सहाय्यक यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना अजिंठा वर्ल्ड हेरिटेज गाईड बुक आणि संभाजीनगरचे कलाकार एम.आर. पिंपरे यांची पेंटिंग बुक भेट दिली. डुकाटेल यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत आभार मानले. डॅ. डुकाटेल आणि त्यांची पत्नी या दोघांनीही लेणीच्या कलाकृतींचे कौतुक केले. तसेच येथे मनसोक्त छायाचित्र काढण्याचा आनंद घेतला. ^ तुम्ही आमचं ज्या पद्धतीने स्वागत केलं, त्याबद्दल धन्यवाद. हे स्थळ अतिशय कौतुकास्पद आहे. माझ्या हनिमून ट्रिपमध्ये या अद्भुत स्थळाला भेट देता आली, याचा मला आनंद आहे. हा क्षण माझ्यासाठी आयुष्यभर न विसरता येण्यासारखा आहे. -डॉ. केनेथ डुकाटेल
डोणगाव, हर्सूल तसेच आसेगाव मंडळासाठी पीक कापणी प्रयोग
डोणगाव, हर्सुल आणि आसेगाव मंडळासाठी संयुक्तपणे पिक कापणी प्रयोग यशस्वीपणे पार पडला. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत २०२५ मध्ये मोठे बदल करण्यात आले. एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आली. त्याऐवजी उत्पादनावर आधारित सुधारित योजना लागू झाली. या योजनेत नुकसानभरपाईची जबाबदारी विमा कंपनीवर राहणार आहे. भरपाई एकूण जमा हप्त्याच्या ११०% किंवा बर्न कॉस्टनुसार दिली जाणार आहे. डोणगाव, हर्सुल आणि आसेगाव मंडळात ७० ते ८० टक्के पिकांचे नुकसान झाले. शासनाने संयुक्त पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर केली. महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी अनुदान जमा करण्यात आले. त्यामुळे खरिप हंगामातील उत्पादन केवळ २० ते ३० टक्के राहिल्याचे स्पष्ट झाले. कापूस पिकासाठी पिंपळगाव दिवशी आणि मका पिकासाठी सुलतानाबाद गावाची निवड करण्यात आली. २७ नोव्हेंबर रोजी सुलतानाबाद आणि २८ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव दिवशी येथे कापणी प्रयोग पार पडले. यावेळी शेतकरी कृती समितीचे इंजिनिअर महेशभाई गुजर, सुलतानाबादचे सरपंच कारभारी गायके, तलाठी कड साहेब, पिंपळगावचे तलाठी गायके साहेब, भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी सागर सोमासे आणि निवड झालेल्या गटातील शेतकरी उपस्थित होते. अतिवृष्टी आणि पीक विमा याबाबत सातत्याने पाठपुरावा करणारी गंगापूर तालुक्यातील शेतकरी कृती समितीने यंदाही लक्ष केंद्रीत केले. महेशभाई गुजर यांनी सांगितले की, सरकारने पीक विमा नियमात बदल केले नसते, तर गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ रक्कम मिळाली असती. मात्र, ऐनवेळी नियम बदलल्याने शेतकरी हक्काच्या विम्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी समितीचा पाठपुरावा सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी:सौरपंप योजनेच्या अंमलबजावणीचा बोजवारा
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामावर सौर कृषिपंपाच्या विलंबाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात झालेल्या पावसामुळे हरभरा आणि गहू पिकांपासून चांगले उत्पादन मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र सौरपंप न मिळाल्यामुळे ही आशा धूसर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर कृषिपंप योजना सुरू केली. या योजनेत जिल्ह्यातील १,०५,१९३ शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्यापैकी ३८,३२१ अर्ज ऑनलाइन भरले गेले. ३६,०४२ अर्जांची छाननी पूर्ण झाली. ३०,१८१ अर्ज मंजूर झाले. २,२७९ अर्जांची छाननी प्रलंबित आहे. प्रत्यक्षात फक्त १०,९५५ शेतकऱ्यांच्या शेतातच पंप बसवले गेले आहेत. शासनाने ६० दिवसांत पंप देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रक्रिया ढिसाळ असल्याने उर्वरित शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे त्यांना महावितरणच्या वीजपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्या पुरवठ्यात वारंवार खंड पडतो. परिणामी, मुबलक पाणी असूनही रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी विजेची गरज आहे. पैसे भरूनही सौर पंप न मिळाल्याने शेतकरी दररोज महावितरण कार्यालयात जाऊन पंपाबाबत विचारणा करत आहेत. मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि चिंता वाढत आहे. सौर पंप अर्जांची स्थिती एकूण अर्ज : १,०५,१९३ ऑनलाइन भरणा : ३८,३२१ छाननी पूर्ण : ३६,०४२ मंजूर अर्ज : ३०,१८१ छाननी प्रलंबित : २,२७९ कार्यान्वित पंप : १०,९५५
सिल्लोड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून आला. अपवादात्मक अनुचित प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडल्याची माहिती पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. सिल्लोडमध्ये सरासरी ७४.५१ टक्के मतदान झाले. ५४,८०५ मतदारसंख्या असलेल्या सिल्लोडमध्ये ६१ मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली होती. या वेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून द्यायचा असल्याने आणि तोही सर्वसाधारण प्रवर्गाचा असल्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या वतीने मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्याची चढाओढ दिसून आली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार व भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांच्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मतदान केंद्राबाहेर शाब्दिक चकमक उडाली होती. याशिवाय काही मतदान केंद्रांवर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना विरोधकांनी हुसकावून लावले. शहरातील मतदारांमध्ये सात वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीमुळे उत्साह जाणवला. मात्र, मतमोजणी वीस दिवस पुढे ढकलल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर देखील काही मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. सरासरी मतदान हे ७४.५१ टक्के झाले आहे. प्रतिनिधी | खुलताबाद नगर परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. किरकोळ घटना वगळता सर्वत्र सुरळीत मतदान झाले. दिवसभरात एकूण ८२.२६ टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. विशेष म्हणजे, मतदान प्रक्रियेत महिला मतदारांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. नगराध्यक्षपदाचे ९ उमेदवारांचे व ७३ नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे सकाळी ९.३० वाजेपर्यंत एकूण १०.३८% मतदान झाले होते. यात पुरुष : ९०२, महिला : ६३३ यांचा समावेश होता. सकाळी ११.३० वाजेपर्यंत २५.३१% मतदान झाले. यात पुरुष : १९३९, महिला : १८०१ तर दुपारी १.३० वाजेपर्यंत ४३.३८% मतदान झाले. यात पुरुष : ३१७०, महिला ३२३९, दुपारी ३.३० वाजेपर्यंत : ६०.६०% मतदान झाले. पुरुष : ४४०४ तर महिला ४५८४ यांचा सहभाग होता. शहरातील १० प्रभागांमधील एकूण १९ मतदान केंद्रांवर मतदान झाले. यापैकी दोन केंद्रांवर किरकोळ तणाव निर्माण झाला असला, तरी उर्वरित १७ केंद्रांवर पूर्ण शांततेत मतदान पार पडले. खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीत १ नगराध्यक्ष पदासाठी व २० नगरसेवक पदासाठी ही मतदान प्रक्रिया पार पडली. यात १ नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते तर २० नगरसेवक पदासाठी ७३ उमेदवार रिंगणात होते सायंकाळी वाढली गर्दी सायंकाळी ४ वाजल्यानंतर मतदान केंद्रांवर मोठी गर्दी दिसून आली. विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय होता. अनेक केंद्रांवर ही गर्दी रात्री आठ वाजेपर्यंत कायम होती. पोलिस अधीक्षकांची भेट ः पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी खुलताबाद येथील प्रभाग क्रमांक ३ आणि ५ मधील मतदान केंद्रांना भेट दिली.
शहरातील द्वारका सर्कल व मुंबईनाका येथील वाहतूक कोंडीत ट्रॅव्हल्स बसेसचा मोठा हातभार आहे. परंतु आता हा प्रश्न निकाली लागणार आहे. मनपाने या दोन्ही ठिकाणी उभ्या राहणाऱ्या बसेससाठी तपोवन येथील सिटी लिंक बस डेपो येथील जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ट्रॅव्हल्स संघटना मनपाला वर्षाला २०.७२ लाख रुपये भाडे अदा करेल. द्वारका व मुंबईनाका या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी असते. त्यात मोठा हातभार खासगी ट्रॅव्हल्सचा आहे. या ठिकाणी उभे राहून ते प्रवासी पिकअप करतात व सोडतात. येथून बस थांबे हलवावे अशी सूचना नाशिक बस ओनर्स ॲन्ड ऑपरेटर संघटनेला मनपाने दिली होती. एजन्सी चालकांनी पर्यायी जागा द्यावी अशी मागणी केली. त्यानुसार मनपाने सिटी लिंक बस डेपोची जागा दिली आहे. शंभर बसेसच्या मुक्कामामुळे समस्या मुंबईनाका व द्वारका येथे जवळपास शंभर ट्रॅव्हल्स बसेस उभ्या राहतात. भररस्त्यावरच उभे रहात असल्याने या दोन्ही ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होते. या ट्रॅव्हल्स कंपनीवर कारवाई करा, अशी नागरिकांची मागणी होती. वाहतूक पोलिसांनीही या दोन्ही ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तपोवनात जागा उपलब्ध करून दया असा पर्याय मनपाला सुचवला होता. त्यांना पर्यायी जागा दिल्याने त्यांचा पार्किंगचा प्रश्न सुटेल. वाहन पार्किंगसाठी प्रशस्त जागा हवी आहे. या ठिकाणी उभे राहून ते प्रवासी पिकअप करतात व सोडतात. येथून बस थांबे हलवावे अशी सूचना नाशिक बस ओनर्स ॲन्ड ऑपरेटर संघटनेला मनपाने दिली होती. एजन्सी चालकांनी पर्यायी जागा द्यावी अशी मागणी केली. त्यानुसार मनपाने सिटी लिंक बस डेपोची जागा दिली आहे. सिंहस्थात हलावावा लागेल मुक्काम तपोवन टर्मिनलच्या जागेत सायंकाळी ७ ते १० या वेळेत पार्किंग करता येणार नाही. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत मात्र ही जागा वापरता येणार नाही. शहरात द्वारका व मुंबईनाका हे दोनही महत्त्वाची ठिकाणे आहेत. ट्रॅव्हल्स बसेसची ये-जा व पार्किंगमुळे येथे मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पार्किंगसाठी प्रशस्त जागा हवी होती. मनपाने तपोवन येथे जागा दिल्याने वाहतूक कोंडी प्रश्न सुटेल. दिलीप बेनिवाल, सचिव, नाशिक डेली बस सर्व्हिस असो
लग्नासाठी ‘स्त्रीधन’ म्हणून ३ लाख रुपये उकळले. उभयतांच्या संमतीने लग्न करत असल्याची नोंद स्टॅम्प पेपरवर केली. मुलगी मुलासोबत कारमधून सासरी जाण्यास निघाली. काही अंतर पार केल्यानंतर त्यांच्या कारसमोर दुसरी कार येते. समोरचा चालक कार आडवी लावतो. मग मुलगी या कारमधून उतरून दुसऱ्या कारमध्ये बसते अन् काही समजण्याच्या आत कार वेगाने निघून जाते... सुनियोजित पद्धतीने रचलेल्या या कटात अहिल्यानगर जिल्ह्यातील एका विवाहेच्छुक तरुण शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातील २९ वर्षांच्या तरुण शेतकऱ्याचे लग्नासाठी प्रयत्न सुरू होते. नेमके हेच रस्त्याच्या कामावरील सुपरवायझर अरविंद राठोड याने ओळखले. राठोड याने “आमच्या गावाकडे चांगले स्थळ आहे. मुलीला वडील नाहीत, ती सध्या आई-भावासोबत राहते आणि कंपनीत नोकरी करते,’ अशी पार्श्वभूमी सांगून तरुणाचा विश्वास संपादन केला. व्हॉट्सॲपवर फोटो पाठवले. त्या तरुणाने माया शिंदे नावाच्या मुलीला पसंत केले. लग्नासाठी थेट ३ लाख रुपये ‘स्त्रीधन’ म्हणून द्यावे लागतील, अशी अट त्या वेळी ठेवली. मुलगी पसंत असल्याने तरुणाने या टोळीवर विश्वास ठेवला. काही कळण्याआत कारमधून उतरून ‘ती’ झाली गायब सर्वकाही व्यवस्थित पार पडेल, असे वाटत असतानाच या प्रकरणाने वळण घेतले. तरुण आणि त्याचे कुटुंबीय नियोजित नवरी मुलगी माया शिंदे हिला घेऊन त्यांच्या कारमधून घराच्या दिशेने निघाले. त्या वेळी अचानक मागून एक पांढऱ्या रंगाची, विनाक्रमांकाची आय-ट्वेंटी कार वेगाने आली. चालकाने ओव्हरटेक करून कार रस्त्यात आडवी लावली. कारमध्ये अज्ञात चार जण होते. काही समजण्याच्या आत गाडीतून नवरी उतरली आणि काही क्षणांत आडव्या लावलेल्या कारमध्ये जाऊन बसली. लगेच ती कार वेगाने निघून गेली. हे पाहून गाडीतील सर्वांनाच धक्का बसला. तरुणाने लगेच मायाला फोन केला, तर तोही बंद होता. तिच्या घरी जाऊन पाहिले तर तेथे कुणीच नव्हते. आई सविता शिंदेचाही फोन बंद होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी अरविंद राठोड, बुड्डा राठोड, सविता शिंदे आणि माया शिंदे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. नोटरी केल्याने बसला विश्वास ३० नोव्हेंबर रोजी तरुण कुटुंबीयांसह बजाजनगर येथे मायाच्या घरी पोहोचला. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि दोन्ही बाजूंनी ‘पसंती’ दर्शवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील कोर्टात जाऊन १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नवरदेव-नवरीच्या संमतीने लग्न करत असल्याची नोटरी करून घेतली. त्यामुळे त्याला आपली फसवणूक होत आहे, याचा संशयही आला नाही. नोटरी झाल्यानंतर त्याने ठरल्याप्रमाणे ३ लाख रुपये (रोख आणि यूपीआयद्वारे) मायाची आई सविता शिंदेला दिले. ‘तुम्ही आजच मुलीला घेऊन जा आणि उद्या गावी लग्न लावा,’ असा सल्ला तिच्या आईने तरुणाला दिला.
जंजाळ यांचा आक्रमकपणा भाजपच्या पचनी पडेल का?:पक्षात प्रवेश देण्यापूर्वी भाजपकडून चाचपणी सुरू
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासोबत जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचे मतभेद अद्याप मिटलेले नाहीत. पैठणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी शिरसाट आणि जंजाळ एकाच व्यासपीठावर आले, मात्र एकमेकांना बोलले नाहीत. पालकमंत्र्यांना न भेटणारे जंजाळ यांच्या भाजप शहराध्यक्षांसोबत भेटी वाढल्या आहेत. स्वबळावर लढताना जंजाळ यांच्यामुळे किती प्रभागांत पक्षाला लाभ होईल, त्यांचा आक्रमकपणा पक्षाला पचनी पडेल का, याची चाचपणी भाजपकडून करण्यात येत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. पालकमंत्री शिरसाट आणि जिल्हाप्रमुख जंजाळ यांच्यातील वाद टोकाला गेले. या वादात तोडगा निघण्यापूर्वी त्यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. याबाबत शहराध्यक्ष किशोर शितोळे म्हणाले की, राजेंद्र जंजाळ माझे मित्र आहेत. आमच्या भेटीगाठी नेहमी होत असतात. अशात भेटी वाढल्या आहेत. एका विवाह समारंभात आम्ही दोन तास गप्पादेखील मारल्या. भाजपमध्ये दोन मतप्रवाह भाजपमध्ये जंजाळ यांच्या प्रवेशाबाबत दोन मतप्रवाह आहेत. यामध्ये एका गटाचा जंजाळ यांच्या प्रवेशाला विरोध आहे. त्यांचा आक्रमकपणा भाजपच्या संस्कारात बसेल का, याची चर्चा पक्षात आहे. त्यांच्या प्रवेशाने किती जागांवर प्रभाव पडू शकतो, याची माहिती घेण्यात येत आहे. पक्षनेतृत्व निर्णय घेईल पक्षाचे नेते एकनाथ शिंदे या वादावर निर्णय घेणार आहेत. त्यावर बोलणे योग्य नाही. कोण कुणाला भेटते, याची माहिती मला नाही. लग्नात भेटणे याचा अर्थ भेट होत नाही. - संजय शिरसाट, पालकमंत्री शिंदे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय अडचणीच्या काळात काम करून विजय मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी. पक्ष मजबूत आहे तेथे उद्धवसेनेतील लोकांना घेतल्याने गटबाजी निर्माण झाली आहे. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीतील निर्णयानंतर मी काय करायचे ते ठरवणार. - राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख. सावेंच्या माध्यमातून जवळीक अतुल सावे निवडून आल्यानंतर जंजाळ यांच्या वॉर्डात सावे आणि पालकमंत्री शिरसाट यांचा सत्कार केला होता. याच कार्यक्रमात सावे यांनी त्यांच्या विजयात जंजाळ यांचा मोठा वाटा असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले होते. जंजाळ यांचे सावेंसोबत मैत्रीपूर्ण संबध आहेत. याच माध्यमातून जंजाळ भाजपच्या जवळ गेल्याचे मानले जाते.
डॉ. गौरी गर्जे पालवे आत्महत्या प्रकरणात मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याच्या प्रेयसीने अखेर वरळी पोलिस ठाण्यात जबाब नोंदवला असून गौरीला घरात सापडलेल्या गर्भपात कागदपत्रांवरून तिने सांगितले २०२२ पासून माझा आणि अनंतचा कोणताही संबंध नाही. फेब्रुवारी महिन्यात लग्न झालेल्या डॉक्टर गौरीने मुंबईतील निवासस्थानी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. घराच्या शिफ्टिंगदरम्यान गौरीला काही कागदपत्रे मिळाली होती. ज्यात अनंत गर्जे याच्या जुन्या प्रेयसीचा उल्लेख होता. या कागदपत्रांमध्ये गर्भपाताच्या रिपोर्ट्सवर पतीच्या नावापुढे अनंत गर्जे असे नमूद होते. यामुळे दोघांमध्ये वाद वाढल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सांगितले होते. पोलिसांनी संशयित अनंत गर्जेची मानसशास्त्रीय तपासणी (पॉलिग्राफ टेस्ट) करण्याची मागणी कोर्टाकडे केली आहे, जी वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गौरीचा मृतदेह आढळल्यावर अनंतने खिडकीतून फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता. या वेळी त्याच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्याची माहिती आहे.
तोतया आयएएस म्हणून वावरणाऱ्या कल्पना भागवतला बेस्ट आयएएस अधिकारी असल्याचे सर्टिफिकेट देणारे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांनी तिला लेटरहेडवर आयएएस अधिकारी संबोधत तिने सामाजिक व धार्मिक कार्य चांगल्या पद्धतीने केले असल्याचे लिहिले होते. त्यांचे प्रमाणपत्र आढळल्यावर त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी (२ डिसेंबर) संध्याकाळी उशिरा ते सिडको पोलिस ठाण्यात हजर झाले होते. रात्री उशिरापर्यंत निरीक्षक अतुल येरमे व सहायक निरीक्षक योगेश गायकवाड त्यांचा जबाब नोंदवत होते. सूत्रांनी सांगितले की, डॉ. पठाण यांनी प्रमाणपत्र दिल्याची कबुली दिली. मात्र, तिची ओळख नेमकी कोणाच्या माध्यमातून झाली होती, याबाबत समाधानकारक उत्तर दिलेले नाही. पठाण यांच्याशिवाय कल्पना भाड्याने राहत असलेल्या घरमालकाचीही चौकशी झाली. मात्र त्यांच्याकडून कुठलीही ठोस माहिती मिळाली नाही. पोलिस आयुक्त प्रवीण पवार त्यांच्या कन्येच्या विवाहामुळे सुटीवर होते. सोमवारी कामावर रुजू झाल्यावर त्यांनी मंगळवारी या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. यात मिळालेली माहिती, पुराव्यांची त्यांनी स्वतः तपासणी केली. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकरांसह येरमेंना तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या. त्यांनीही आरोपींची चौकशी केल्याचे कळते. सूत्रांनी सांगितले की, कल्पना आता तपासात सहकार्य करत नाही. आतापर्यंत २८ जणांना नोटीस सिडको पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत २८ जणांना चौकशीच्या नोटीसा बजावल्या. त्यातील ५ ते ६ जणांचीच चौकशी झाली. १ जानेवारी ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत कल्पनाच्या खात्यावर ३२ लाख ६८ हजार ८६२ रुपये आले. त्यात अशरफ खिल (अफगाणिस्तान) याने २ लाख ३१ हजार २०० रुपये, सुंदर हरि ऊर्फ सुरेश जैन व अभिजित क्षीरसागर यांनी प्रत्येकी दीड लाख, दत्तात्रय शेटे ७ लाख ८५ हजार, रमेश मुळे २ लाख २५ हजार ५०० रुपये, सुधाकर जाधव १ लाख १८ हजार रुपये, नागेश अष्टीकर १ लाख ४५ हजार रुपये आणि समाधान बहादुरे ९७ हजार ५०० रुपये पाठवल्याचे समोर आले आहे. हे सर्वजण नोटिसा बजावल्या नंतर समोर आलेले नाहीत. आयएसएसच्या यादीतील शेटे मृत, तर लोढा मिळेना तपासात तिच्याकडे मिळालेली आयएसएसची यादी मनोज लोढा व दत्तात्रय शेटे यांनी दिल्याचे ती सांगते. त्याच यादीत कल्पनाने स्वत:चे नाव घुसून आयएएस असल्याचा बनाव रचला. यातील शेटे मृत, तर लोढा पश्चिम महाराष्ट्रातील बडा व्यावसायिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ऊस क्षेत्र वाढल्याने राज्यात यंदा साखरेचे बंपर उत्पादन:यंदाच्या हंगामात 342 लाख टन उत्पादनाचा अंदाज
या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतात साखर उत्पादनात ४३% वाढ झाली आहे.॰ चालू विपणन वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत एकूण उत्पादन ४.११ दशलक्ष टनांपेक्षा जास्त झाले. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयएसएमए) ने मंगळवारी अहवाल प्रकाशित केला. यानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत राज्याचे साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या ४.६ लाख टनांवरून ३.७ पटीने वाढून १६.९ लाख टनांवर पोहोचले आहे. देशाच्या एकूण साखर उत्पादनात झालेल्या ४३% वाढीमध्ये महाराष्ट्राचा ‘सिंहाचा वाटा’ आहे. एकूणच या वर्षी महाराष्ट्रात साखरेचे बंपर उत्पादन होण्याचे संकेत आहेत. का होणार बंपर उत्पादन... आयएसएमएच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील ऊस लागवडीचे क्षेत्र १४.७१ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. यंदाचा चांगला मान्सून आणि धरणांमधील मुबलक पाणीसाठा यामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात उसाचे पीक जोमदार आहे. तसेच, साखर उतारा सुधारल्याने त्याचबरोबर कारखाने वेळेवर सुरू झाल्याने उत्पादनाने उच्चांक गाठला आहे. महाराष्ट्राची स्थिती साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या ४.६ दशलक्ष टनांवरून ३.७ पट वाढून १.६९ दशलक्ष टन झाले आहे. उसाची चांगली कापणी आणि उच्च साखर उतारा दरामुळे, देशभरात गाळपाचे काम वेगाने वाढत आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ४२८ कारखाने कार्यरत होते, तर गेल्या वर्षी याच कालावधीत फक्त ३७६ कारखाने होते. १.४ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन केले. गेल्या वर्षी याच कालावधीत उत्पादित झालेल्या १.२८ दशलक्ष टनांपेक्षा हे ९.४% जास्त आहे. शेतकऱ्यांच्या निषेधामुळे तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या कर्नाटकमधील उत्पादन ८.१२ दशलक्ष टनांवरून ४.७% ने कमी होऊन ७.७४ दशलक्ष टन झाले. गुजरातमध्ये ते ९२,००० टन आणि तामिळनाडूमध्ये ३५,००० टन होते. महाराष्ट्रातील ऊस पिकाखालील क्षेत्र राज्यात ऊस पिकाखालील सरासरी क्षेत्र सद्यःस्थितीत १३ लाख ११ हजार ८०८ हेक्टरइतके आहे. मागील वर्षी हे ऊस क्षेत्र १० लाख ५० हजार हेक्टर इतके होते. चालू वर्षी नव्याने आडसाली, पूर्वहंगामी ऊस लागवडीमध्ये गतवर्षापेक्षा सुमारे ६६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर लागवड वाढली आहे. २०२५-२६ साठी उत्पादनाचा अंदाज… राज्य २०२४-२५ २०२५-२६महाराष्ट्र ९३.५१ १३०.००कर्नाटक ५४.८९ ६३.५उत्तर प्रदेश १०१.०१ १०३.२इतर राज्ये ४६.६९ ४६.८एकूण २९६.१० ३४२.५(आकडे लाख टनांत) शेतकऱ्यांवर काय परिणाम केंद्राने एफआरपीमध्ये वाढ करून ती ३,५५० रुपये प्रतिटन केली आहे. कोल्हापूरच्या भोगावती कारखान्याने ३,६५३ रु.प्रतिटन उच्चांकी दर दिल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्याची चिन्हे आहेत. मात्र, साखरेची एमएसपी अजूनही ३१ रु. किलोवर स्थिर आहे. ग्राहकांवर काय परिणाम होणार उत्पादन खर्च वाढल्याने कारखान्यांनी एमएसपी ४१ रु. करण्याची मागणी आहे. एमएसपी वाढली नाही, तर बंपर उत्पादनानंतरही एफआरपीची पूर्ण रक्कम वेळेवर देणे कारखान्यांना जिकिरीचे ठरू शकते. वाढलेल्या उत्पादनामुळे साखरेचे दर स्थिर किंवा किंचित कमी होतील.
राज्यातील २६४ नगर परिषद, नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी अंदाजे ६५ टक्के मतदान झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिलेल्या आदेशानुसार या मतदानाचा निकाल न्यायालयीन अपिलामुळे लांबणीवर पडलेल्या २४ नगर परिषद, पंचायत तसेच १५४ सदस्यांसाठीच्या निवडणुकीनंतर म्हणजे २१ डिसेंबरला लागणार आहे. आधी २४ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि नंतर मतमोजणीचा निकाल लांबणीवर पडल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळीवरील राजकारणाला दिशा देणाऱ्या आणि सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ५-१० वर्षांनंतर झाल्या. बहुतांश ठिकाणी महायुतीतच वर्चस्वाची लढाई होती. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदानाच्या दिवशी राडा झाला. वाद, हाणामारी, दगडफेकीच्या किमान ८० मोठ्या घटना घडल्या. बीडच्या शाहुनगर येथे बोगस मतदानावरून अजित पवार गट, शरद पवार गटात दगडफेक झाली. गेवराईत भाजपचे माजी आ. लक्ष्मण पवार व अजित पवार गटाचे जयसिंह पंडित एकमेकांच्या अंगावर धावून गेले. महाडमध्ये शिंदेसेना-अजित पवार गट वाद उफाळला. थेट पिस्तूल रोखण्याचाही आरोप झाला. विजय वड्डेटीवारराज्य निवडणूक आयोग महायुती सरकारच्या हाताचे बाहुले झाले आहे. या सरकारच्या इशाऱ्यावरच आयोग काम करीत आहे. रोहित पवारराज्यात आज जो काही मोठा गोंधळ निर्माण झाला आहे त्यासाठी निवडणूक आयोगासह भाजपदेखील तेवढाच जबाबदार आहे. उद्धव - राज - आदित्य ठाकरेउद्धव-आयोग, न्यायालयावर न बोललेलेच बरे. राज-देशात मनमानी सुरू आहे. आदित्य-निवडणूक आयोगाची सर्कस सुरू आहे का? केंद्रीय मंत्री खडसेंनी पोलिसांना सुनावले मुक्ताईनगरात मतदान केंद्राच्या हद्दीत प्रवेशावरून केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी पोलिसांना सुनावले. दिवसभर युती खडसे समर्थकांमध्ये सहा वेळा वाद झाला. त्यात राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथ खडसे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. महाड : शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत हाणामारीशिंदेसेनेचे मंत्री गोगावलेंचा मुलगा विकास यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे समर्थक सुशांत जांबरे व कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. वाहन फोडण्यात आले. विकास यांनी पिस्तूल रोखल्याचा आरोप तटकरे समर्थकांनी केला. यंत्रणेचे अपयश, हे फारच चुकीचे घडले : मुख्यमंत्रीएकुणात जे काही घडले ते यंत्रणेचे अपयश आहे. गेल्या २५-३० वर्षांत मी स्थानिक स्वराज्य संस्थांत असा प्रकार पाहिला नाही. हे फारच चुकीचे घडले आहे. निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी. २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता, एक्झिट पोलवर २० पर्यंत बंदीनागपूर | राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींचा निकाल २१ डिसेंबरला एकत्र जाहीर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी झालेल्या सुनावणीत दिले. २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहील. तोपर्यंत कुणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. आज दिलेल्या निर्णयामुळे मतदान झालेल्या सर्व ईव्हीएम २१ तारखेपर्यंत ठेवाव्या लागणार आहेत. त्यामुळे प्रशासनावरील ताण वाढण्याची चिन्हे आहेत. निवडणूक पारदर्शी राहावी याकरिता हा निर्णय देण्यात आला आहे. उद्या ३ डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालांमुळे पुढच्या निवडणुकीवर परिणाम हाेऊ शकतो असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. देवळी (जि. वर्धा) येथील उमेश कामडी व इतर दोघे आणि वरोरा येथील भाजपचे उमेदवार सचिन नागोराव चुटे यांच्यासह इतर काही जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती अनिल किलोर, रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात हे निर्देश देण्यात आले. आयोगाने १० आठवड्यांमध्ये स्पष्ट नियमावली तयार करावीछत्रपती संभाजीनगर | राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणूक तसेच पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांत मतदान व निकाल प्रक्रियेविषयी निवडणूक आयोगाने १० आठवड्यांमध्ये सुस्पष्ट नियमावली तयार करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी व न्या. हितेन वेणेगावकर यांनी मंगळवारी दिले. ही नियमावली लगेचच होऊ घातलेल्या जि .प. मनपा आदी निवडणुकीपूर्वी करावी, असेही खंडपीठाने म्हटले आहे. तत्पूर्वी सध्या सुरू असलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला करावी, असे आदेशही खंडपीठाने दिले. बीड, अंबाजोगाई, कोपरगाव, पैठण येथील याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर निर्णयासाठी मंगळवारी सुनावणी झाली. तेव्हा १२.३० वाजता निवडणूक आयोगाचे ॲड. सचिंद्र शेट्ये यांनी नागपूर खंडपीठाने २१ डिसेंबर रोजी मतमोजणीचे आदेश दिल्याची माहिती दिली. त्यानंतर सुनावणी तहकूब होऊन ३ वाजता सुरू झाली. त्यात उपरोक्त आदेश देण्यात आले. महायुतीत मोठा भाऊ कोण, हे निकालावरून स्पष्ट होईल ५-१० वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा पहिला टप्पा मंगळवारी मार्गी लागला. दुसरा टप्पा २१ डिसेंबरला पूर्ण होईल. पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागात, छोट्या शहरांवर कोणाचे वर्चस्व तसेच महायुतीत कोण मोठा भाऊ हे निकालावरून स्पष्ट होईल.भाजप : विधानसभेत भाजपला मिळालेले मोठे यश कितपत टिकाऊ आहे, याचा अंदाज २१ रोजी येईल. शिवाय भाजपतर्फे प्रामुख्याने किल्ला लढवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वगुणाचीही परीक्षा होईल.शिंदेसेना : गेल्या काही महिन्यांपासून भाजप-शिंदेसेनेत संघर्ष वाढला आहे. ग्रामीण भागात शिवसेनेची (शिंदेसेना) पाळेमुळे पक्की असल्याचा दावा केला जातो. त्यात सत्यता आहे की नाही, हे सर्वांसमोर येईल.अजित पवार गट : पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा प्रमुख गड मानला जातो. अजित पवारांनी त्यावरच लक्ष केंद्रित केल्याने ते तुलनेने चांगले यश मिळवू शकतात.उद्धवसेना : विधानसभेत विरोधी आघाडीमध्ये नंबर वन असलेल्या उद्धवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आघाडीवर असल्याचे दाखवून देण्याची संधी आहे.काँग्रेस-शरद पवार गट : मोजक्या नगर परिषद, पंचायतींपुरतेच अस्तित्व राहू शकते. एकाच वेळी मतमोजणीचे आदेश देऊन न्यायालयाने लोकशाही प्रक्रियेची अखंडता सुनिश्चित केली आहे. हा निर्णय संवैधानिक लोकशाही मूल्यांचे रक्षण करणारा आहे. यात प्रशासनावर ताण वाढला असला तरी निष्पक्षता, पारदर्शकता या मूलभूत स्तंभांना बळकटी मिळाली. आता निवडणूक आयोगाला ‘मुक्त व निष्पक्ष निवडणुकां’च्या मार्गदर्शक तत्त्वांचे कठोर पालन करावे लागेल. न्यायव्यवस्थेचा हा थेट हस्तक्षेप निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेप्रति मतदारांचा विश्वास वाढवतो. हा आदेश आगामी निवडणुकांत अखंडता, निष्पक्षता टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण आधार ठरेल. आ. बांगरांनी महिलेला मतदान केंद्रातच मतदान कुठे करायचे ते सांगितले, तत्काळ गुन्हा दाखल हिंगोलीत प्रभाग क्रमांक तीनवरील मतदान केंद्रावर आ. संतोष बांगरांनी महिला मतदारास कुठे मतदान करायचे हे सांगितले. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल झाला आहे.
पार्टी केल्यानंतर झालेल्या वादातून आईवरून शिवी दिल्याचा राग मनात धरून मित्रानेच मित्राचा गळा आवळून निर्घृण खून करून मृतदेह विद्युत खांबाला वायरने बांधून ठेवल्याची घटना कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात मंगळवारी उघडकीस आली. दुचाकीतील पेट्रोल संपल्याचा बहाणा करून शांत डोक्याने हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अवघ्या सहा तासांत मनीष जालिंदर राऊत (२८, रा. कळंबा रिंगरोड, राऊत कॉलनी) याला अटक केली. सिद्धू शंकर बनवी (२०, सध्या रा. वाशी नाका, कळंबा रिंगरोड, मूळ रा. शिकनंदी, ता. गोकाक, जि. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हॉकी स्टेडियम परिसरातील एका लाइटच्या खांबाला तरुणास बांधल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता तरुण मृत झाल्याचे दिसून आले. त्याला वायरने खांबाला बांधण्यात आले होते. तरुणाच्या तोंडातून रक्त येत होते. हा खून असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणसह चारही पोलिस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांना घटनास्थळी पाचारण केले. मृत तरुणाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मृताच्या खिशात गुटख्याची पुडी मृताच्या खिशामध्ये ओळखीचा कोणताही पुरावा नव्हता. मृताच्या खिशात केवळ दोन गुटख्याच्या पुड्या मिळाल्या. पोलिसांनी खबऱ्यांचे नेटवर्क वापरून मृताची ओळख पटवली. सकाळी १० च्या सुमारास मृत तरुण सिद्धू बनवी असल्याचे समोर आले. मृत सिद्धूच्या मोठ्या भावाकडे शिवानंद ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरमध्ये वाळू, खडी विटा भरण्याचे काम सिद्धू व मनीष करतात. हे दोघेही एकमेकांचे जिवलग मित्र आहेत. मात्र, असे असूनही मित्राचा खून केल्याने परिसरात याचीच चर्चा आहे. रात्री २ पर्यंत केले मद्यप्राशन रविवारी सुटी असल्याने रात्री अकराच्या सुमारास दोघे दारू पिण्यासाठी बसले होते. रात्री २ वाजेपर्यंत दारू पिऊन झाल्यानंतर हॉटेलमध्ये ते जेवणासाठी गेले होते. जेवताना दोघांमध्ये वाद झाला. यातूनच सिद्धूने मनीषला आईवरून शिवीगाळ केली. जेवण आटोपून दोघेही दुचाकीवरून घरी निघाले. यावेळी हे दोघे लघुशंकेसाठी थांबले. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी रस्त्याच्या कडेला खांबाला टेकून बसलेल्या सिद्धूचा तेथीलच वायरने मनीषने गळा आवळला आणि त्याचा मृतदेह खांबाला बांधला.
अहिल्यानगर येथील १९ वर्षीय युवक वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे याने वाराणसी येथील वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयात २ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या काळात सलग ५० दिवस दंडक्रम पारायण पूर्ण केले. या पारायणममध्ये सुमारे २ हजार वैदिक मंत्रांचा समावेश होता. देवव्रतने हे सर्व मंत्र आणि वैदिक श्लोक परंपरेनुसार उच्चारले. काशीमध्ये (वाराणसी) २०० वर्षांनंतर ही परंपरा पूर्ण झाली आहे. यापूर्वी २०० वर्षांपूर्वी नाशिक येथे वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी ही परंपरा पार पाडली होती. देवव्रतचे वडील महेश चंद्रकांत रेखे हेच त्याचे गुरू आहेत. त्याच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल शृंगेरी मठाने त्याला सन्मानित केले. श्री शृंगेरी शारदा पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांनी त्याला सोनेरी आभूषण आणि १ लाख ११६ रुपये देऊन सन्मानित केले. यापूर्वी वाराणसीतील रथयात्रा चौकातून महमूरगंजपर्यंत एक मिरवणूकही काढण्यात आली होती. दरम्यान, महेश याचे नाशिकसह राज्यातील सर्वच शहरांतून मोठे कौतुक करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी केले कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवव्रतच्या या अद्वितीय कामगिरीचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, काशीचा खासदार असल्यामुळे ही असामान्य कामगिरी या पवित्र नगरीत शक्य झाली याचा त्यांना आनंद आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याचे कौतुक केले आहे.
जिल्ह्यातील ३ नगरपालिकांमध्ये ७०.९४ टक्के मतदान
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर आणि औसा या तीन नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. उदगीर नगरपालिकेसाठी सर्वात कमी ६८.१२ टक्के तर औसा नगरपालिकेसाठी सर्वाधिक ७५.७३ टक्के मतदान झाले. अहमदपूर नगरपालिकेसाठी ७३.०६ टक्के मतदान झाले. उदगीर नगरपालिका क्षेत्रात ४२६३६ पुरुष, ४०५२६ महिला, इतर १७ असे एकुण ८३१७९ मतदार आहेत. […] The post जिल्ह्यातील ३ नगरपालिकांमध्ये ७०.९४ टक्के मतदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
श्रीमती वैशालीताई देशमुख यांचे महिला भगिनींकडून अभिनंदन
लातूर : प्रतिनिधी तालुक्यातील वैशालीनगर, निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचा सोलापूर येथील इंचगिरी महाराज मठाच्या मठाधीश परमपूज्य साध्वी पुष्पलता पाटील महाराज यांच्याकडून आदर्श माता म्हणून स्वयं लिखित भुरक्षायज्ञ पुस्तक देऊन गौरविण्यात आले. त्याबद्दल श्रीमती वैशालीताई देशमुख यांचे महिला भगिनींकडून अभिनंदन करण्यात आले. लातूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीताताई […] The post श्रीमती वैशालीताई देशमुख यांचे महिला भगिनींकडून अभिनंदन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवा, रोहित्रे व वीज यंत्रणेची हानी टाळा
लातूर : प्रतिनिधी रब्बीचा हंगाम सुरू झाला की कृषीपंपाचा वापर वाढत जातो. अनेकदा रोहीत्रांसोबतच पाण्याची मोटर जळाल्याच्या तक्रारी वाढत जातात. विजेचा भार नियंत्रीत करणारे कॅपॅसीटरचा वापर फार कमी शेतकरी करतात त्याचबरोबर अॅटोस्विचचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परिणामी अचानक विजेचा भार वाढल्याने वीज यंत्रणे सोबतच पाण्याची मोटर जळण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे शेतक-यांनी कृषीपंपाचा वापर योग्य […] The post कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवा, रोहित्रे व वीज यंत्रणेची हानी टाळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अहमदपूर नगर परिषदेसाठी ७३.०६ टक्के मतदान
अहमदपूर : प्रतिनिधी नगरपरिषद निवडणूक सोमवार, दि.२ डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहात, सुरळीत व शांततेत पार पडली आहे. नगराध्यक्ष पदासह एकूण २५ नगरसेवक पदांसाठी मतदारांनी लोकशाहीचा उत्सव साजरा केला. सायंकाळी ५.३० पर्यंत २६,५५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून ७०.४४ टक्के मतदानाची नोंद झाली आणि शेवटी एकुण २७५४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मंगळवारी सकाळी साडेसात […] The post अहमदपूर नगर परिषदेसाठी ७३.०६ टक्के मतदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने महिला जागीच ठार
रेणापूर : प्रतिनिधी भरधाव ट्रकची धडक लागून टायरखाली आल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन ३५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पिंपळफाटा (रेणापूर) येथे मंगळवारी (दि .२ ) सकाळी ९.२० वाजण्याच्या सुमारास घडली. पिंपळफाटा रेणापूर येथील नरसिंह चौकात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाईहून रेणापूर मार्गे तेलंगणा राज्यात जाणारा ट्रक क्रमांक ए.पी. ३९ टी ३७८६ भरधाव वेगाने जात […] The post ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने महिला जागीच ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उदगीर नगर परिषदेसाठी ६८.१२ टक्के मतदान
उदगीर : प्रतिनिधी उदगीर नगर परिषदेसाठी ६८.१२ टक्के मतदान झाले. एकूण ५६६६३ मतदान झाले पुरुष ६९.१ टक्के (२९४२३ ) महिला ६७.१९ टक्के (२७२३२) महिलां तर ५२.९४ टक्के तर इतर ९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण ९१ केंद्रावर ४४० कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुव्यवस्थेसाठी १०० पोलीस कर्मचा-यासह अशा वर्कर व अंगणवाडी कार्यकर्ता यांचाही सहभाग […] The post उदगीर नगर परिषदेसाठी ६८.१२ टक्के मतदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औसा नगर परिषदेसाठी ७५ टक्के मतदान
औसा : प्रतिनिधी औसा नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षासह २३ नगरसेवक पदासाठी ७८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून शहरात मतदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकशाहीचा उत्सव साजरा करीत औसा नगर पालिकेसाठी.७५.६७ टक्के मतदान झाले आहे. औसा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी औसा शहरात सर्वच ३६ मतदान केंद्रांवर मतदान शांततेत आणि उत्साहात पार पडले. औसा शहरातील एकूण मतदान […] The post औसा नगर परिषदेसाठी ७५ टक्के मतदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अफवांवर विश्वास ठेवू नका : आ. निलंगेकर
निलंगा : प्रतिनिधी महाराष्ट्रात २४ नगरपालिका व २०४ प्रभागातील निवडणुका रद्द झाल्या आहेत. त्यात निलंगा नगर परिषदेच्या निवडणुकीचा समावेश आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचा भाजपचा कसलाच संबंध नाही कारण निवडणूक आयोग ही स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. आमदार निलंगेकर म्हणाले […] The post अफवांवर विश्वास ठेवू नका : आ. निलंगेकर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निवडणूक आयोग आणि भाजपाची मिलीभगत
निलंगा : प्रतिनिधी निलंगा नगर पालिका निवडणुकीच्या मतदानाला केवळ १२-१४ तास शिल्लक असताना निवडणुकीस स्थगिती देण्याचा निर्णय अनाकलनीय आणि धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाची ही कृती जनतेच्या मतदान अधिकारावर गदा आणणारी व लोकशाहीविरोधी आहे. निलंगा नगरपालिकेत पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने येथील आमदारांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्र्यांनी निवडणूक स्थगित करण्याचा डाव आखला. निवडणूक आयोग आणि भाजपची मिलिभगत असल्याचे यावरून […] The post निवडणूक आयोग आणि भाजपाची मिलीभगत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) समाजात बुद्धिभेद निर्माण करत असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोष्टींवर ताबा मिळवण्याचे काम करत असल्याचा आरोप केला. ते काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित २१ व्या 'सेवा_कर्तव्य_त्याग' सप्ताह उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. हा सप्ताह काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांच्या संकल्पनेतून २ ते ९ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी पुणे येथील एस.एम. जोशी फाउंडेशन सभागृह, नवी पेठ येथे सपकाळ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार अध्यक्षस्थानी होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रदेश काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, संजय बालगुडे, श्रीरंग चव्हाण आणि कैलास कदम उपस्थित होते. सपकाळ यांनी यावेळी प्रामाणिकपणा हा देशाचा मूळ स्वभाव असून तो सध्या विसरला जात असल्याची खंत व्यक्त केली. सपकाळ म्हणाले की, आपला स्वाभिमान भाषा, धर्म किंवा लिंग यात नसून इतिहास आणि कर्तृत्वात आहे. आपला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा समजून घेणे महत्त्वाचे आहे. महात्मा गांधींना आपण राष्ट्रपिता म्हणतो, कारण त्यांनीच 'भारत' या संकल्पनेला जन्म देऊन 'राष्ट्र' ही कल्पना सर्वांच्या मनात रुजवली. सध्याच्या राजकारणात सेवेऐवजी 'मेवा' मिळवण्याची धडपड सुरू आहे. सेवेमागे 'मेवा' आहे की 'भय' हे तपासले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, हे समजून घेणे आवश्यक आहे, कारण तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्य मिळत नाही आणि मानसिक संतुलन बिघडते. सोनिया गांधींच्या योगदानाबद्दल बोलताना सपकाळ म्हणाले की, राजकारणात त्यांना अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी त्यावर मात केली. २२ वर्षांच्या असताना त्या भारतात आल्या आणि २२ वर्षे राजीव गांधींसोबत संसार केला. देशाची सून म्हणून त्या आजही काम करत आहेत, याचा देशवासीयांना अभिमान वाटायला हवा. सोनिया गांधी एक विचार असून त्या त्याग, विचार आणि संस्कृती पुढे घेऊन जात आहेत. राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची घाई नाही, तर ते काँग्रेसचे नेतृत्व आणि विचारधारा पुढे नेण्याचे काम करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री समता, बंधुता या मूल्यांवर 'नांगर फिरवत' असून, सगळ्या जातींमध्ये भांडणे लावली जात आहेत, असा आरोपही सपकाळ यांनी केला.
अवैध रेती वाहतूक करणारे 5 हायवा जप्त:अमरावती महसूल विभागाची अमरावती-डवरगाव रस्त्यावर कारवाई
अमरावती तालुक्यात गौण खनिजाचा अवैधरित्या उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अवैध रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक जप्त करण्यात आले. ही कारवाई मंगळवार, २ डिसेंबर रोजी सकाळी करण्यात आली. एसडीओ अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे आणि गौण खनिज अधिकारी प्रणीता चापले यांच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली. अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाच्या भरारी पथकांकडून सध्या सातत्याने कारवाई केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्यांना गुप्त सूत्रांकडून अवैध वाहतुकीची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे २ डिसेंबर रोजी पहाटे पथक गस्तीवर असताना अमरावती-डवरगाव रस्त्यावर ही वाहने आढळून आली. पथकाने मालवाहू वाहनांची तपासणी केली असता, एमएच २७ डीटी ९३६६, एमएच २७ डीटी ६४९४, एमएच २७ डीटी ४५५५, एमएच २७ डीएल ६४९४ आणि एमएच २७ डीटी १४८० क्रमांकाचे हायवा (ट्रक) अवैधरित्या रेती वाहतूक करत असल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधित पथकाने पाचही ट्रक मुद्देमालासह जप्त केले. जप्त करण्यात आलेले हे पाचही ट्रक सध्या अमरावतीच्या तहसील कार्यालयात उभे करण्यात आले आहेत. या कारवाईत मंडळ अधिकारी सुनील उगले, गजानन हिवसे, ग्राम महसूल अधिकारी सुनील भगत, हेमंत गावंडे, रामकृष्ण इंगळे, पवन बोंडे, रामदास गोडे आणि पोलीस कर्मचारी यांनीही सहभाग घेतला.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वत्र सावळागोंधळ सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडले आहेत. यामुळे आता मतपेट्या पुढील 15-16 दिवस गोडाऊनमध्ये पडून राहतील. हा कालावधी सरकारला त्यामध्ये काही 'घालमेल' किंवा फेरफार करण्यासाठी पुरेसा आहे, अशी भीती राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील राज्यातील 262 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज (मंगळवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार होता. मात्र, हायकोर्टाच्या आदेशामुळे आता हा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नेमके काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? या निर्णयावर संताप व्यक्त करताना चव्हाण म्हणाले, निवडणूक आयोग किती अक्षमतेने काम करत आहे, हे यातून स्पष्ट झाले आहे. मतमोजणी इतके दिवस पुढे ढकलल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास उडत चालला आहे. 15 दिवस मतपेट्या सुरक्षेत असल्या तरी, सत्ताधाऱ्यांना त्यात गडबड करायला भरपूर वेळ मिळणार आहे, अशी शंका घेण्यास वाव आहे. न्यायालयात सरकारला अपयश नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल निकाल लांबणीवर पडण्यास राज्य सरकारच जबाबदार असल्याचा दावा चव्हाण यांनी केला. हे प्रकरण जेव्हा न्यायालयात सुरू होते, तेव्हा सरकारी वकिलांनी प्रभावीपणे बाजू मांडणे अपेक्षित होते. जर सरकारने योग्य युक्तिवाद केला असता, तर निकाल पुढे ढकलण्याची वेळ आली नसती. मात्र, न्यायालयात सरकारला अपयश आले आणि आता त्याचे खापर निवडणूक आयोगावर फोडले जात आहे, अशी टीका त्यांनी केली. हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, गेली 10 वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे भाजपने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. हा लोकशाही संपवण्याचा डाव असून, देशात हळूहळू हुकूमशाहीची पावले उमटत आहेत. जनता जागृत झाली नाही, तर असेच सुरू राहील. सरकार आणि आयोग केवळ एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहेत. न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरकार झोपले होते का? असा परखड सवालही त्यांनी उपस्थित केला.
२१ तारखेपर्यंत मतदानयंत्रे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी आता ३ डिसेंबर ऐवजी एकत्रितरित्या २१ डिसेंबरला होणार असल्याने मतदान यंत्रे १९ दिवस सुरक्षित ठेवण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी २४ तास सीसीटीव्हीसह सशस्त्र चोख सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. सोबतच मतदान यंत्राच्या सुरक्षेबाबत निवडणूक लढवणा-या […] The post २१ तारखेपर्यंत मतदानयंत्रे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कृषि विभागाला ५ हजार कोटी द्या
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या तिजोरीत पैसा नसल्याचा फटका कृषी विभागालाही बसला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांसाठी कृषी समृध्दी योजनेची घोषणा केली. पण त्यांची पूर्तता होत नाही. या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ५ हजार कोटी रुपयांची गरज आहे. त्यामुळे पुरवणी मागण्याव्दारे जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […] The post कृषि विभागाला ५ हजार कोटी द्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी २६१ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी आज राज्यभरात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मतदानादरम्यान अनेक ठिकाणी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडे झाले. बोगस मतदानाचे आरोप, मतदानयंत्रातील बिघाड यावरूनही अनेक ठिकाणी वातावरण तापले. परंतु या घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. दरम्यान, २४ नगर परिषद, नगर पंचायतींसाठी २० डिसेंबरपर्यंत मतदान पुढे ढकलल्याने […] The post मतमोजणी आता २१ डिसेंबरला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
टॅरिफ थेट ५० टक्क्यावरुन २० टक्के होणार?
वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेत ट्रेड डील बाबत आतापर्यंत सहावेळा चर्चा झाली आहे. पण अद्यापपर्यंत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. डोनाल्ड ट्रम्प अधून-मधून दोन्ही देशांमध्ये पॉझिटिव्ह डील होणार असं सांगत असतात. एका परदेशी संस्थेने सुद्धा भारत-अमेरिकेत ट्रेड डील लवकर पूर्ण होईल असे म्हटले आहे. भारतावर सध्या लागू असलेला ५० टक्के टॅरिफ कमी होऊन २० टक्के […] The post टॅरिफ थेट ५० टक्क्यावरुन २० टक्के होणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एसआयआरवर चर्चेस सत्ताधारी तयार
नवी दिल्ली : लोकसभा ९ डिसेंबर रोजी निवडणूक सुधारणांवर (एसआयआर) चर्चा करणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून संसदेत तात्काळ चर्चा व्हावी यासाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाने चर्चेला सहमती दर्शवली आहे. तत्पुर्वी निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या या मतदार यादी दुरुस्ती प्रक्रियेचा देशभरातून विरोध होताना पाहायला मिळत आहे. सोमवारी संसदेपासून ते रस्त्यापर्यंत तीव्र विरोध दिसून आला. संसदेत विरोधकांनी […] The post एसआयआरवर चर्चेस सत्ताधारी तयार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी
वॉशिंग्टन : व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. रविवारी अर्थात ३० नोव्हेंबरला ट्रम्प यांनी मादुरो यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे मान्य केले होते. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, यासंदर्भातील माहिती समोर आली नव्हती. डोनाल्ड ट्रम्प यांनी फोनवरून निकोलस मादुरो यांना थेट धमकी दिली आहे. जर तुम्हाला […] The post डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील सर्व 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्याचबरोबर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान संपल्याच्या पुढील अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीत, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगानेही संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. ईव्हीएम सुरक्षिततेसाठी कडेकोट बंदोबस्ताचे निर्देश मतदान यंत्रांची हातळणी काळजीपूर्वक करण्यात यावी. मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोदामांसाठी 24 तास चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करावी. सुरक्षा उपकरणे (उदा. गोदामाच्या प्रवेद्वाराबाहेरील सीसीटीव्ही, सुरक्षा आलार्म सिस्टीम, अग्निशमन यंत्रणा इ.) व्यवस्थित कार्यांन्वित असल्याची खात्री करून घ्यावी. राजकीय पक्षांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींना गोदामांबाबत आणि तिथल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत अवगत करावे. त्याचबरोबर निवडणूक लढविणारे उमेदवार अथवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना गोदामाचे प्रवेशद्वार दिसेल अशा ठिकाणी बसण्यासाठी जागा निश्चित करून द्यावी, असेही निर्देश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान झाले; तसेच सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी आता 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य भरात उत्साहात मतदान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी आज सायंकाळी संपुष्टात आली. राज्यातील 262 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज (मंगळवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7.30 वाजता सुरू झालेली ही मतदान प्रक्रिया सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत चालली. राज्यभरात मतदारांनी उत्साहान मतदान केले. आज पार पडलेल्या मतदानानंतर हजारो उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. आता उमेदवारांसह संपूर्ण राज्याचे लक्ष 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे आणि निकालाकडे लागले आहे. स्थानिक पातळीवर कोणाची सत्ता येणार आणि कोण बाजी मारणार? हे आता निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची ३९ वी आवृत्ती रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. देशातील पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत ७० हून अधिक परदेशी खेळाडूंसह सुमारे १५ हजार धावपटू सहभागी होणार आहेत. सणस मैदानाजवळच्या हॉटेल कल्पना-विश्व येथून पहाटे ३ वाजता ४२.१९५ किमीची महिला-पुरुष पूर्ण मॅरेथॉन सुरू होईल. याच ठिकाणाहून अर्ध मॅरेथॉन, १० किमी, ५ किमी आणि व्हीलचेअर स्पर्धांचाही प्रारंभ होणार आहे. केनिया, इथिओपिया, दक्षिण आफ्रिका, नेपाळ आणि श्रीलंका यांसारख्या देशांतील ७० हून अधिक परदेशी खेळाडू या स्पर्धेत भाग घेतील. गतविजेती ज्योती गवते, केनियाचा सायमन मवॉगी तसेच सेनादल, रेल्वे, पोलीस, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, बॉम्बे सॅपर्स, एसआरपीएफ आणि एनडीए येथील अव्वल धावपटू मैदानात उतरणार आहेत. एकूण ११ गटांमध्ये धावपटू सहभागी होतील. या स्पर्धेच्या मार्गाला एम्स (AIMS) आंतरराष्ट्रीय संस्थेची मान्यता मिळाली आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे विजेत्यांना एकूण ३५ लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील. बांबू सोसायटी ऑफ इंडियाकडून बांबूपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक ट्रॉफी देण्यात येणार आहेत. यंदाचे ध्येयवाक्य टिकाऊ आणि पर्यावरणीय जबाबदारी असे आहे. स्पर्धेची सर्व पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. मॅरेथॉन भवन येथे ५ डिसेंबरपासून ‘एक्स्पो’ प्रदर्शन, टी-शर्ट आणि बीब नंबर वाटप सुरू होईल. सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार आणि महाराष्ट्र मंडळ अध्यक्षा नेहा दामले यांच्या हस्ते याचे उद्घाटन होईल. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर आणि रेखा भिडे यांचीही उपस्थिती असेल. धावपटूंसाठी भक्कम वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. डॉ. राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली ८० डॉक्टर, ३०० परिचारक आणि फिजिओ कार्यरत असतील. सणस मैदानावर २५ खाटांचे मिनी रुग्णालय उभारले जाईल. प्रत्येक किलोमीटरला पाणी, डॉक्टर, नर्स आणि अॅम्ब्युलन्स उपलब्ध असतील, तर दर अडीच किलोमीटरला एनर्जी ड्रिंक, फळे आणि स्पंजिंग बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. १७ हौशी धावपटू संघटना हायड्रेशन पॉइंट्स सांभाळतील. सायकलोहोलिक्सचे ७५ सायकल पायलट्स, ५० पंच आणि २० मोटारसायकल पायलट्स स्पर्धेवर नियंत्रण ठेवतील. पुणे पोलीस आणि वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त असेल. बक्षीस वितरण समारंभ सकाळी ८ वाजता सणस मैदानावर पार पडेल.
पुण्यात 'पेन्शन सर्टिफिकेट' देण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाची १६ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर चोरट्यांनी मॉडेल कॉलनीतील ७० वर्षीय वृद्धाला लक्ष्य करत ही आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक मॉडेल कॉलनी परिसरात राहतात आणि त्यांचे एका राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. राष्ट्रीयीकृत बँकेकडून ज्येष्ठांना 'पेन्शन सर्टिफिकेट' देण्यात येणार असल्याची बतावणी त्यांनी केली. चोरट्यांनी ज्येष्ठाला बोलण्यात गुंतवून त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली. या माहितीचा गैरवापर करत चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून १६ लाख ५ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतले. बँक खात्यातून रक्कम चोरट्यांच्या खात्यात वळवण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अश्विनी ननावरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ओळखीतील महिलेकडून दोन लाखांचे दागिने चोरी कपाटात ठेवलेले दागिने चोरीला जाण्याची भीती वाटल्याने एका महिलेने पिंपात दागिने ठेवले. पिंपात ठेवलेले दागिने चोरीला जाणार नाहीत, असे महिलेला वाटले. मात्र, महिलेच्या ओळखीतील एका महिलेने पिंपात ठेवलेले एक लाख ९७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना नुकतीच खडकी भागात घडली. याबाबत एका महिलेने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ३७ वर्षीय खडकीतील इंदिरानगर भागात राहायला आहेत. या प्रकरणात एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर वसाहतीत दाटवाटीने घरे आहेत. कपाटात ठेवलेले दागिने चोरीला जाण्याची भीती वाटत असल्याने तक्रारदार महिलेने पिंपात दागिने ठेवले होते. आरोपी महिला तक्रारदार महिलेच्या ओळखीची आहे. आरोपी महिला तक्रारदार महिलेच्या नेहमी घरी यायची. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून महिलेने पिंपात ठेवलेले दागिने चोरून नेले. दागिने चोरल्यानंतर आरोपी महिलेने खडकीतील एका सराफाकडे गहाण ठेवले. ही बाब तपासात उघडकीस आल्यानंतर महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कर्मचारी सकपाळ तपास करत आहेत.
जन्मठेप भोगलेल्या अनिल-सुनीलच्या कलाकृतींचे प्रदर्शन:प्रेरणापथ प्रकल्पातून सामाजिक विषयांवर भाष्य
रागाच्या भरात झालेल्या चुकीमुळे जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या अनिल आणि सुनील (नावे बदलली आहेत) यांनी कारागृहाच्या नकारात्मक वातावरणात चित्रकला आणि लेखनाचा आधार घेतला. कॅनव्हास, रंग आणि ब्रश यांच्या साथीने त्यांची शिक्षा सुसह्य झाली. कारागृह प्रशासनाच्या मदतीने त्यांनी आपली कला जोपासली; अनिल चित्रकार म्हणून तर सुनील त्यांच्या चित्रांना शब्दांचे रंग देतो. त्यांच्या कलाकृतींचे नुकतेच प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. शिक्षा पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर गुन्हेगारीकडे पुन्हा वळू नये आणि सन्मानाने जगता यावे यासाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र कारागृह प्रशासनाच्या सहकार्याने “प्रेरणापथ” हा पथदर्शी प्रकल्प अनेक वर्षांपासून राबवला जात आहे. या प्रकल्पातून आतापर्यंत ४२ मुक्त बांधवांना रोजगार किंवा नोकरी मिळाली आहे. याच प्रेरणापथ प्रकल्पाच्या माध्यमातून अनिल-सुनील यांच्या चित्र-लेखनाचे संयुक्त प्रदर्शन स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन (बाजीराव रोड, सणस ग्राउंडसमोर, पुणे) येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते. बालगुन्हेगारी, स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, बुवाबाजी, स्त्रीभ्रूणहत्या, परंपरा, बालमजुरी आणि पर्यावरण अशा ज्वलंत सामाजिक विषयांवर आधारित ही चित्रे पाहणाऱ्यांशी थेट संवाद साधतात. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी नगरविकास व सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अपर पोलीस महासंचालक (कारागृह) सुहास वारके, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, विशेष कारागृह निरीक्षक योगेश देसाई आणि येरवडा कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले की, “मुक्त बांधवांना ताठ मानेने जगता यावे हा प्रेरणापथचा मुख्य उद्देश आहे. पुणेकरांनी या कलाकारांना दिलेली साथ आणि दाद हेच त्यांच्या नव्या आयुष्याची पहाट आहे.” आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप यांनी प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्याचे आवाहन केले.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. प्रभाग क्रमांक १७ मधील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या मतदान केंद्रावर भाजप खासदार रक्षा खडसे आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आमनेसामने आले. यावेळी दोन्ही गटांत जोरदार खडाजंगी झाली. भाजपने मारहाणीचा आणि दडपशाहीचा आरोप केला, तर बाहेरून माणसे आणून बोगस मतदान करत असल्याचा शिवसेनेने दावा केल्याने केंद्रावर तणाव निर्माण झाला होता. दादागिरी खपवून घेणार नाही, रक्षा खडसेंचा संताप यावेळी खासदार रक्षा खडसे प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असून, उमेदवारांना मतदान केंद्रात जाण्यापासून रोखले जात आहे. ही कसली लोकशाही? एवढी दादागिरी आणि दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही, असा संताप खडसे यांनी व्यक्त केला. तसेच, पोलीस प्रशासनाला जाब विचारत या प्रकाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बोगस मतदान रोखणे गुंडगिरी आहे का? रक्षा खडसे पोलिसांशी बोलत असतानाच आमदार चंद्रकांत पाटील कार्यकर्त्यांसह केंद्रावर धडकले. त्यांनी खडसेंचे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांच्यावरच पलटवार केला. पाटील म्हणाले, मलकापूरवरून माणसे आणून, त्यांचे बोगस आयडी कार्ड बनवून मतदान करवून घेणे ही दादागिरी नाही का? आम्ही या बोगस मतदानाविरोधात आवाज उठवला, तर आम्हाला गुंड ठरवले जात आहे. केंद्रीय मंत्री असूनही तुम्ही इथे याचना करत आहात? तुम्ही जमिनी बळकावल्या, लोकांचे केबल कनेक्शन तोडले, ती खरी गुंडगिरी आहे, असा घणाघात चंद्रकांत पाटलांनी केला. पोलिसांची कारवाई: तीन संशयित ताब्यात मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात हा वाद विकोपाला गेल्याने पोलिसांची मोठी धावपळ झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना मतदान केंद्राबाहेर काढले. दरम्यान, बोगस मतदानाचा प्रयत्न करणाऱ्या तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. हे ही वाचा... सुनील तटकरेंनीच गुंड पाठवून हल्ला घडवला:महाडमधील राड्यानंतर भरत गोगावलेंचा गंभीर आरोप महाड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिंदे गट आणि अजित पवार गटाचे समर्थक आमनेसामने आल्याने महाडमध्ये तुफान राडा झाला. गाड्यांची तोडफोड आणि रिव्हॉल्व्हर काढण्यापर्यंत हा वाद विकोपाला गेला. या घटनेनंतर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझा मुलगा विकास गोगावले आणि कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यासाठी सुनील तटकरेंनीच गुंड पाठवून षडयंत्र रचले, असा दावा गोगावले यांनी केल्याने कोकणातील राजकारण ढवळून निघाले आहे. सविस्तर वाचा...
स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ अॅप बंधनकारक; विरोधक आक्रमक
नवी दिल्ली : विरोधकांचे आयफोन हॅक केले जात असल्याचा आरोप काही वर्षांपूर्वी मोदी सरकारवर करण्यात आला होता. आता संचार साथी हे अॅप प्रत्येक स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करणे अनिवार्य करण्याचा आदेश काढण्यात आला होता. यावरून विरोधकांनी लोकसभेत मुद्दा मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावर आता केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. विरोधी पक्षनेते […] The post स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ अॅप बंधनकारक; विरोधक आक्रमक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी
नवी दिल्ली : काळया पैशांविरोधातील लढाई अपयशी ठरल्याचे केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. सरकारने गाजावाजा केला असला तरी प्रत्यक्षात जमा झालेली रक्कम अत्यंत कमी असल्याचे आकडे दाखवतात. लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार १ जुलै २०१५ ते ३० सप्टेंबर २०१५ दरम्यान परदेशातील अघोषित मालमत्तेच्या ६८४ प्रकरणांमध्ये ४,१६४ कोटींचा खुलासा झाला. कर आणि दंड स्वरुपात […] The post काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची कपात करणार?
नवी दिल्ली : आरबीआयने या वर्षात दोनवेळा रेपो दरात कपात करुन सर्वसामान्यांचे ओझे हलके केले आहे. आता आणखी एकदा तुमचा ईएमआयचा हप्ता कमी होऊ शकतो. देशातील प्रमुख क्रेडिट रेटिंग एजन्सी केअरएजच्या ताज्या अहवालानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या आगामी डिसेंबर महिन्याच्या पतधोरण आढाव्यात २५ बेसिस पॉईंट्सने (०.२५%) रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे. वेगाने कमी […] The post रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची कपात करणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एअरवर्दीनेस सर्टिफिकेट एक्सपायर असताना ८ वेळा उड्डाण
नवी दिल्ली : विमानांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवणारी डीजीसीए संस्था एअर इंडियाच्या गलथान कारभारावर चांगलीच संतापली आहे. उड्डाणासाठी अयोग्य असलेले विमान वारंवार चालवल्यामुळे शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात आले होते, असे डीजीसीएने स्पष्ट केले आहे. एका सरकारी अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, १६४ आसनी एअरबस ए३२० या विमानाचे एअरवर्दीनेस सर्टिफिकेट कालबा झाल्यानंतरही, त्याला २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी आठ […] The post एअरवर्दीनेस सर्टिफिकेट एक्सपायर असताना ८ वेळा उड्डाण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नगर पालिका निवडणुकीची मतमोजणी लांबल्यामुळे ऐनवेळी स्ट्राँगरुम तयार करण्यासाठी निवडणुक यंत्रणेची धावपळ सुरु झाली असून पोलिस विभागाकडूनही कडेकोट बंदोबस्त ठेवण्याची तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून आकडेमोड करून जय पराजयाची गणिते मांडली जात आहेत. राज्यात २६४ नगर पालिका निवडणुकीसाठी मंगळवारी ता. २ मतदान झाले. त्यानंतर बुधवारी ता. ३ रोजी मतमोजणी होणार असल्यामुळे अनेक ठिकाणी निवडणूक विभागाने मतदान यंत्र ठेवण्यासाठी तात्पुरती व्यवस्था केली होती. तसेच पोलिस विभागानेही केवळ एक दिवसांसाठीच पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्याचे नियोजन केले होते. बुधवारी मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्रावर आवश्यक बंदोबस्तासह कर्मचाऱ्यांचेही नियोजन केले होते. त्यामुळे बुधवारी सायंकाळी संपूर्ण निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. मात्र मतमोजणी प्रक्रिया लांबणीवर पडल्यामुळे निवडणुक विभागाची चांगलीच धावपळ सुरु झाली. मतमोजणीनंतर १९ दिवस मतदान यंत्र सांभाळण्याचे काम निवडणुक विभागाला करावे लागणार आहे. त्यासाठी स्ट्राँग रुम, आवश्यक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम करण्यासाठी यंत्रणेची चांगलीच धावपळ सुरु झाली होती. सायंकाळ पर्यंत सर्वच ठिकाणी स्ट्राँग रुम ततयार करण्यात आल्या आहेत. या शिवाय स्ट्राँग रुमच्या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन देखील पोलिस विभागाने सुरु केले आहे. स्ट्राँग रुमच्या परिसरात चोविस तास पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. या शिवाय आता मतदान संपल्यानंतर उमेदवार व त्यांच्या समर्थकांची आकडेमोड सुरु झाली असून आपापल्या प्रभागात किती मतदान झाले. किती मतदान आपल्याला मिळेल, मत विभाजनाचा फायदा कसे होईल याचे गणित मांडले जात आहेत. यातून आपलाच विजय कसा आहे हे समजाऊन सांगितले जात असल्याचे चित्र आहे.
अबब…दारूपेक्षा चकण्याचा उद्योग ७.४५ बिलियन डॉलर्सवर
नवी दिल्ली : अनेकदा तुम्ही पाहिले असेल की दारू पिताना बारमध्ये चकना म्हणून शेंगदाणे दिले जातात. दारू पिणारी माणसे चकण्यात दिलेले शेंगदाणे (मूंगफली) चघळल असतात. अवघ्या पाच किंवा दहा रुपयांच्या छोट्या पॅकेटमध्ये मिळणारा हा चकना आज भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. पण याच साध्या शेंगदाण्यांचा एकूण व्यवसाय तुम्हाला थक्क करणारा आहे. २०२४ पर्यंत भारतातील पीनट मार्केटचा […] The post अबब…दारूपेक्षा चकण्याचा उद्योग ७.४५ बिलियन डॉलर्सवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एका 19 वर्षीय तरुणाने आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने आणि कठोर साधनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे असे या तरुणाचे नाव असून, त्याने काशी (वाराणसी) येथे अत्यंत कठीण मानले जाणारे ‘दंडक्रम पारायण’ पूर्ण केले आहे. त्याच्या या अद्वितीय कामगिरीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत त्याचे भरभरून कौतुक केले आहे. वेदमूर्ती देवव्रत रेखे याने काशीमध्ये राहून शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदिनी शाखेतील तब्बल 2000 मंत्रांचा समावेश असलेले ‘दंडक्रम पारायण’ अवघ्या 50 दिवसांत पूर्ण केले आहे. ही साधना कोणत्याही व्यत्ययाशिवाय (अखंड) पूर्ण करणे अत्यंत जिकिरीचे आणि कठीण मानले जाते. यामध्ये हजारो वैदिक श्लोक आणि पवित्र शब्दांचे अचूक उच्चार आणि स्मरणशक्तीचा कस लागतो. देवव्रतने आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनाखाली ही अवघड परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडली आहे. या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान मोदी यांनी देवव्रत महेश रेखे यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी काय म्हटले? पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''19 वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी जे केले आहे ते येणाऱ्या पिढ्या नक्की लक्षात ठेवतील. भारतीय संस्कृतीबद्दल आस्था असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचा अभिमान आहे. त्यांनी 50 दिवसांत शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदिनी शाखेतील 2000 मंत्रांचा समावेश असलेला दंडक्रम पारायण कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण केलं आहे. यामध्ये अनेक वैदिक श्लोक आणि पवित्र शब्दांचा समावेश असतो, ते आपल्या गुरु परंपराच्या सर्वोत्तमतेचं मूर्त रूप आहेत. काशीचा खासदार म्हणून मला आनंद आहे की या पवित्र शहरात हे घडलं. त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या संतांना, विद्वानांना आणि भारतातील विविध संघटनांना माझा प्रणाम.” 19 वर्ष के देवव्रत महेश रेखे जी ने जो उपलब्धि हासिल की है, वो जानकर मन प्रफुल्लित हो गया है। उनकी ये सफलता हमारी आने वाली पीढ़ियों की प्रेरणा बनने वाली है। भारतीय संस्कृति में आस्था रखने वाले हर एक व्यक्ति को ये जानकर अच्छा लगेगा कि श्री देवव्रत ने शुक्ल यजुर्वेद की माध्यन्दिन… pic.twitter.com/YL9bVwK36o— Narendra Modi (@narendramodi) December 2, 2025 योगी आदित्यनाथ यांच्याकडूनही कौतुक पंतप्रधान मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही देवव्रत रेखे यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या मातीत घडलेल्या या हिऱ्याने काशीमध्ये जाऊन वैदिक परंपरेचा झेंडा रोवल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी हा मोठा सन्मान मानला जात आहे.
मतदानाच्या दिवशी कामठी शहरात बोगस मतदानाचा मोठा कट उधळून लावण्यात आला आहे. नागपूर-कामठी रोडवर असलेल्या आशा हॉस्पिटलजवळील एका फार्महाऊसवर निवडणूक विभागाच्या पथकाने धाड टाकली असून, तेथे बोगस मतदानासाठी तयार करण्यात आलेली बनावट ओळखपत्रे आणि बोटावरील शाई पुसण्याचे द्रव्य (केमिकल) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय अग्रवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी भाजप उमेदवार अजय अग्रवाल हे यंत्रणेचा गैरवापर करून बोगस मतदान करवून घेत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक विभागाच्या पथकाने सुनील अग्रवाल यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर छापा टाकला. या कारवाईत पथकाला मोठ्या प्रमाणावर बनावट व्होटर आयडी कार्ड्स आणि बोटाला लावलेली शाई पुसण्यासाठी वापरले जाणारे संशयास्पद द्रव्य मिळून आले आहे. या फार्महाऊसवरूनच बोगस मतदानाचे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप करण्यात येत असून, घटनास्थळी सध्या मोठा गोंधळ सुरू आहे. बोगस मतदान करणाऱ्या 12 तरुणांना अटक एकीकडे फार्महाऊसवर कारवाई सुरू असतानाच, दुसरीकडे कामठीतील 'लाला ओळी' परिसरातील मतदान केंद्रावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 12 तरुणांना सतर्क नागरिक आणि पोलिसांनी रंगेहाथ पकडले. हे सर्व तरुण कन्हान येथील वाघधरे वाडी परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी धक्कादायक कबुली दिली. आम्हाला प्रत्येकी 200 रुपये देऊन मतदान करण्यासाठी आणले होते, असे या तरुणांनी सांगितले आहे. पोलिसांनी या सर्व 12 तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कामठीत तणावपूर्ण शांतता दरम्यान, एकाच वेळी फार्महाऊसवरील धाड आणि मतदान केंद्रावरील बोगस मतदारांची धरपकड यामुळे कामठीत राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. सुलेखा कुंभारे यांनी प्रशासनाला धारेवर धरले असून, भाजप उमेदवार अजय अग्रवाल यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
‘सेवा धर्म महान’ पुस्तिकेचे प्रकाशन
पुणे : प्रतिनिधी कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांना केली जाणारी मदत हे ‘सेवा भारती’च्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठीही ‘सेवा भारती’ने लक्षणीय कार्य केले, अशा शब्दांत ‘सेवा भारती’चे अखिल भारतीय संघटन मंत्री सुधीरकुमार यांनी ‘सेवा भारती’च्या कार्याचा गौरव केला. सोलापूर जिल्ह्यातील पुरामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये ‘सेवा भारती’च्या वतीने मदत कार्य करण्यात आले. या मदत कार्याची […] The post ‘सेवा धर्म महान’ पुस्तिकेचे प्रकाशन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जावई, व्याही, सर्व नातेवाईकांची नावे घुसवली : रावसाहेब दानवे
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी कोणतीही निवडणूक असू द्या भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या कलगीतु-याशिवाय जणू ती अपूर्णच असते. सत्तार नवीन सरकार आल्यापासून महायुतीतच साईडलाईन झालेले आहेत. तर आता नगरपालिका, नगर परिषद निवडणुकीनिमित्त ते सक्रिय झाले. सिल्लोड नगर परिषद निवडणूक त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. दरम्यान दानवे यांनी सत्तारांवर गंभीर आरोप केले […] The post जावई, व्याही, सर्व नातेवाईकांची नावे घुसवली : रावसाहेब दानवे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धनंजय मुंडेंची हत्या होणार होती
गंगाखेड : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची हत्या झाली असती पण ते वाचले असे विधान आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची हत्या झाली असती पण ते वाचले असे विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे […] The post धनंजय मुंडेंची हत्या होणार होती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महानगरपालिकेच्या 20 नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत अक्षम्य चुका आणि बोगस मतदारांचा भरणा असल्याचे समोर आले आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमचे आमदार सुनील शिंदे यांचे नाव यादीत तब्बल 7 वेळा, तर माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे नाव 8 वेळा आले आहे. हा काय सावळागोंधळ सुरू आहे? निवडणूक आयोग म्हणजे एखादी सर्कस झाली आहे का? असा संतप्त सवाल विचारत, मतदार यादीत 33 हजार बोगस मतदान घुसवल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. मराठी मतदारांची नावे दुबार? पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी आयोगाचा भोंगळ कारभार पुराव्यानिशी मांडला. ते म्हणाले, यादीत आमचे आमदार सुनील शिंदे यांचे नाव सात ठिकाणी आले आहे. गंमत म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांचे वय आणि फोटो वेगळा आहे, पण व्यक्ती तीच आहे. श्रद्धा जाधव, खासदार अनिल देसाई आणि ज्योती गायकवाड यांचीही नावे दुबार आली आहेत. विशेष म्हणजे, या दुबार नावांमध्ये मराठी मतदारांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. हा योगायोग आहे की सुनियोजित कट, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मुदत संपल्यानंतर 33 हजार मतदार आले कुठून? आदित्य ठाकरे यांनी आणखी एक गंभीर मुद्दा मांडला. नियमानुसार 1 जुलै 2025 नंतर मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करता येत नाहीत. असे असतानाही, या यादीत तब्बल 33 हजार नवीन मतदार कसे काय आले? असा सवाल त्यांनी केला. तसेच, 5 लाख 86 हजार लोकांची दुबार नोंदणी असून, ज्या मृत व्यक्तींचे डेथ सर्टिफिकेट जमा केले आहे, त्यांची नावेही यादीतून वगळण्यात आलेली नाहीत. यामुळे त्यांच्या नावावर 'प्रॉक्सी वोटिंग' (बोगस मतदान) करण्याचा डाव आहे का? अशी शंका त्यांनी उपस्थित केली. बीएलओंच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह मतदार यादी तपासणीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांवरही (BLO) आदित्य ठाकरेंनी ताशेरे ओढले. ज्यांना धड लिहिता-वाचता येत नाही, असे लोक मतदार तपासणी करत आहेत. हा सर्व प्रकार म्हणजे मुंबईकरांची थट्टा सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. आम्ही BMC, राज्य आणि केंद्र निवडणूक आयोगाला विचारात आहोत तुम्ही काय करत आहात? थट्टा करत आहात, तुम्ही सर्कस करत आहात. हा घोळ तुम्हीच घातलेला आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला. जनचळवळ उभारण्याचा इशारा या सर्व प्रकाराविरोधात आम्ही स्वतः 3 ते 4 हजार हरकती नोंदवल्या आहेत. निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी आम्ही पत्र दिले असून, या विरोधात मोठी जनचळवळ उभी करू, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील कथित मतभेद राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेत. या दोन्ही नेत्यांनी यापूर्वी अनेकदा आपल्यात मतभेद असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. पण त्यानंतरही या चर्चेला पूर्णविराम मिळत नाही. आज अखेर फडणवीसांनी या मुद्यावर सविस्तर उत्तर दिले. पण त्याचवेळी आमच्यात एकमत असते तर आम्ही वेगवेगळ्या पक्षात असतो का? असा सवालही केला. त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. पण त्यानंतरही त्यांनी एकमेकांची भेट घेतली नव्हती. फडणवीस हे शिंदे तयार होण्यापूर्वीच तासभर अगोदर हॉटेलातून निघून गेले. त्यानंतर शिंदे बाहेर पडले. या घटनेमुळे महायुती सरकारमधील 2 बड्या राजकीय पक्षांचे नेतृत्व करणाऱ्या या नेत्यांत काही मतभेद आहेत का? असा प्रश्न माध्यमांत व राजकीय वर्तुळात चर्चिला गेला. त्यावर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी 'साम' वृत्तवाहिनीशी साधलेल्या संवादात सविस्तर उत्तर दिले आहे. शिंदेंशी कोणतेही वाद नाहीत, पण... मुख्यमंत्री म्हणाले, माझ्यात व एकनाथ शिंदे यांच्यात कोणतेही वाद नाहीत. आपल्या घरातही दोन भावांची मते काहीअंशी वेगवेगळी असतात. ती मते एक नसतात. दोन्ही भाऊ प्रखरतेने आपापली मते मांडत असतात. तसेच काही गोष्टींवर आमचे एकमत होत नाही. सगळ्या गोष्टींवर आमचे एकमत असते तर आम्ही वेगवेगळ्या पक्षांत का राहिलो असतो? आम्ही एकच पक्ष असतो. पण आम्ही वेगवेगळे पक्ष आहोत. व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आम्ही एकत्रच आहोत आणि आम्ही एकत्रच राहणार आहोत. एखाद्या निवडणुकीत काही गोष्टी घडल्या की लगेच मतभेद झाले असे काहीही नसते. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. निवडणुका आल्या की आम्ही तुमच्यावर गोष्टी लागू असे करता येत नाही, असे फडणवीस म्हणाले. या निवडणुकीत सर्वच समीकरणे दिसली फडणवीस पुढे म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत तुम्हाला एकनाथ शिंदे व अजित पवार काही ठिकाणी एकत्र दिसले. तर काही ठिकाणी भाजप व एकनाथ शिंदे एकत्र आहेत. काही ठिकाणी आम्ही तिघेही एकत्र होतो. या निवडणुकीत सर्वच प्रकारची समीकरणे दिसून आली. कारण, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. भाजप आपल्या मित्रपक्षांना सोडणार नाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाजप आपल्या मित्रपक्षांना केव्हाच सोडणार नसल्याचेही जोर देऊन सांगितले. आमच्या मित्रांना आमच्यासोबत ठेवण्याचा निर्णय हा सर्वस्वी आमचा आहे. भाजपची ताकद वाढली असली तरी माझे मत आहे की, महाराष्ट्रात आजही आम्हाला दोन्ही मित्रांची गरज आहे. 2029 मध्येही आ्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार आहोत. आम्ही आमची ताकद वाढवतच राहू. पण ताकद वाढली म्हणून मित्रांना सोडून देणार नाही, असे ते म्हणाले.
आखाडा बाळापूर येथील एका व्यक्तीचा रामेश्वरतांडा ते कोपरवाडी मार्गावर कोपरवाडी शिवारातील खून प्रकरणात अनोळखी व्यक्ती विरुध्द सोमवारी ता. १ रात्री उशीरा आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच संशयीतांची चौकशी केली असून त्यातून आता खून प्रकरणाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वरतांडा ते कोपरवाडी मार्गावर कोपरवाडी शिवारात एका व्यक्तीचा मृतेदह सोमवारी ता. १ सकाळी आढळून आला. आखाडा बाळापूर पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेहाचे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारीत केले होते. त्यानंतर सदर मृतदेह पंजाब मोरे (५८ रा. आखाडा बाळापूर) यांचा असल्याचे स्पष्ट झाले होते. मृतदेहाचे हात रुमालाने बांधलेले होेते तर त्यांच्या चेहऱ्यावर जखमाही आढळून आल्या. तर उत्तरीय तपासणीमध्येही त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी नितीन मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. १ रात्री उशीरा अनोळखी व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी तातडीने गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाला रवाना केले. या पथकाने पाच जणांची चौकशी केली आहे. दरम्यान, मयत पंजाब मोरे हे आखाडा बाळापूर येथून कोपरवाडी शिवारात कसे गेले, त्यांच्या सोबत कोण होते याची माहिती घेतली जात असून आखाडा बाळापूर शहरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. त्यावरून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. पुढील दोन दिवसांत या प्रकरणात महत्वाचे धागेेदोरे हाती लागतील असा दावा पोलिसांनी केला आहे.
मला व धनंजय मुंडेंना बहीण-भाऊ म्हणणे बंद करा
बीड : राज्यात सध्या नगर परिषदा व नगरपंतायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पर्यावरण मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज वेगवेगळ्या मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांना सूचना केली की ‘मी व धनंजय मुंडे राजकारणी आहोत, आमच्या कामाबाबत गंभीर आहोत, असे असताना […] The post मला व धनंजय मुंडेंना बहीण-भाऊ म्हणणे बंद करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
२ लाखांचा चायना मांजा जप्त; एकास अटक
अहिल्यानगर : प्रतिनिधी मकर संक्रांतीला अद्याप अवधी असला तरी आकाशात पतंग फडकू लागले आहेत. त्याचबरोबर मानवी जीवन, पशु, पक्षी यांच्यासाठी घातक ठरणारा नायलॉन-प्लास्टिक-चायना मांजाही आढळू लागला आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर शहरातून १ लाख ८५ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. यासंदर्भात एका विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. नायलॉन मांजाची विक्री […] The post २ लाखांचा चायना मांजा जप्त; एकास अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माझ्यावरचे आरोप खोटे, बदनामीचा कट; चित्रा वाघ यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी स्नेहल घुगे नावाच्या महिलेने एका खाजगी चॅनेलवर मुलाखतीत चित्रा वाघ यांनी मला घटस्फोट घ्यायला सांगितले असा दावा केला होता. या दाव्याला प्रत्युत्तर देताना ‘चित्रा वाघ’ स्नेहल घुगे नावाच्या महिलेला मी कधी भेटले नाही, बोलले नाही, कोणताही संवाद नाही. तिचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, असे स्पष्ट केले. चित्रा वाघ […] The post माझ्यावरचे आरोप खोटे, बदनामीचा कट; चित्रा वाघ यांचा आरोप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील निवडणूक निकाल आता २१ डिसेंबरलाच
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नगरपालिका-नगरपंचायतींच्या निवडणुकांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निर्णयामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागला आहे. बुधवार, (३ डिसेंबर) जाहीर होणारे निकाल आता थेट २१ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाला दिलेला हा आदेश म्हणजे राजकारणाच्या नव्या नाट्याची सुरुवात ठरली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि रजनीश व्यास यांच्या खंडपीठाने राज्यातील […] The post राज्यातील निवडणूक निकाल आता २१ डिसेंबरलाच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठांच्या सहभागाने नांदेड येथे होत असलेल्या २७ व्या क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा खेळाडूंचा ताफा आज रवाना झाला. या स्पर्धेत एकूण आठ खेळांचा समावेश असून व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, खो-खो, कबड्डी आणि अॅथलेटिक्स या खेळांतील मुले आणि मुली असे एकूण 164 खेळाडुंचा संघ आणि 30 विविध महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक आणि कर्मचारी असे एकूण 200 लोक पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. खेळाडूंचे मार्गदर्शन व शुभेच्छा देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर हे खाशाबा जाधव क्रीडा संकुलात उपस्थित होते. त्यांनी खेळाडूंशी संवाद साधत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. काळकर म्हणाले की, “विद्यापीठातील आधुनिक क्रीडा सुविधा वापरत खेळाडूंनी राष्ट्रीय तसेच ऑलिंपिक पातळीवर पोहोचण्याचे ध्येय ठेवावे. खेळ हा केवळ करमणुकीचा भाग नसून व्यावसायिक करिअरची एक उत्तम संधी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा मंडळामार्फत उत्कृष्ट ऑलिंपिकपटूंना घडवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.तसेच प्रवासादरम्यान खेळाडूंनी स्वतःची काळजी घेणे स्पर्धेच्या ठिकाणी वातावरणाशी जुळवून घेऊन चांगली स्पर्धा किंवा सामना खेळणे याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके यांनी स्पर्धेविषयी आवश्यक सूचना दिल्या. तसेच प्र-कुलगुरू डॉ. काळकर, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी व विद्यापीठातील सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य सिनेट मेंबर्स तसेच विविध महाविद्यालयातून आलेले शारीरिक शिक्षण संचालक जे या स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक आणि मार्गदर्शक म्हणून काम करणार आहेत अशा सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील अनागोंदीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला धारेवर धरत आयोगाचा हा निर्णय अनाकलनीय असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावत निवडणुका पुढे ढकलल्या. निवडणूक सरसकट पुढे ढकलणे योग्य नाही. आयोगाचा हा निर्णय अनाकलनीय आहे, असे ते म्हणालेत. राज्य निवडणूक आयोगाने अनेक ठिकाणची स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक 20 डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकली आहे. या प्रकरणी राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत असताना आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही आज होणाऱ्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकला आहे. यावर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणी निवडणूक आयोगावर आगपाखड करताना म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने प्रचंड मोठा घोळ घातला आहे. आयोगाचा निर्णय अनाकलनीय सरकारने या प्रकरणी नियमानुसार आपली बाजू सांगितली. पण आयोगाने ती ऐकली नाही. हे चुकीच्या पद्धतीने चालले आहे. ज्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने घोळ घातलात त्या प्रमाणे आता त्यांनी पुढे जावे. आगामी निवडणुका मोठ्या आहेत. हा घोळ राज्य निवडणूक आयोगाने संपवावा, अन्यथा आम्ही प्रचार करायचा आणि निवडणूक आयोगाने एक पत्रक काढून निवडणुका पुढे ढकलायच्या हे योग्य नाही. आयोगाने चुकीचा अर्थ काढून निवडणुका पुढे ढकलल्या. निवडणूक सरसकट पुढे ढकले योग्य नाही. आयोगाचा हा निर्णय अनाकलनीय आहे. आक्षेप असतील तिथे निवडणूक पुढे ढकलायची होती चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगाला मान्य करावा लागतो. मी यापूर्वी अनेकदा आयोगाला अशा पद्धतीने निवडणूक लांबणीवर न टाकण्याची विनंती केली होती. पण नियमांचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. कारण, या संदर्भात कोणतीही हरकत किंवा तक्रार केली नव्हती. नियमांचा चुकीचा अर्थ काढून निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलली. किंबहुना निवडणूक पुढे ढकलायची होतीच, तर ज्या ठिकाणी आक्षेप होता, त्या ठिकाणच्या ढकलायच्या होत्या. यंदा पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. ते म्हणाले, निवडणूक लांबवणे, थांबवणे अथवा अशा पद्धतीचा घोळ घालणे योग्य नाही. त्याचे समर्थन कुणीही करू शकत नाही. कधीही सर्वपक्षीय बैठक नाही. विचारविनिमय नाही. हा एकप्रकारे जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार आहे. निवडणूक आयोगाच्या घोळामुळे हायकोर्टाने असा निर्णय दिला. यामुळे उमेदवारांची घोर निराशा झाली आहे. हे अजिबात योग्य नाही, असेही बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले.
महात्मा ज्योतिराव फुले यांचा ऐतिहासिक वाडा भाड्याने किंवा संगोपनासाठी देण्याच्या सरकारच्या संभाव्य निर्णयाला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शवला आहे. विशेषतः, हा वाडा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या समता परिषदेला देण्याच्या चर्चेला ब्रिगेडने 'फुले-शाहू-आंबेडकर विचारांची हत्या' असे संबोधले आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने सोमवारी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. संभाजी ब्रिगेडने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले वाडा ही केवळ एक इमारत नसून समतेची भूमी आहे. महात्मा फुले यांचे विचार सर्व समाजाला प्रेरणा देणारे असून, ते कोणत्याही एका संघटना किंवा पक्षाची खाजगी मालमत्ता नाहीत. त्यामुळे हा वाडा भाड्याने किंवा संगोपनासाठी कोणालाही देऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. विशेषतः, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, अशा छगन भुजबळ यांना हा वाडा देणे म्हणजे फुले विचारांचा अपमान आहे, असा आरोप ब्रिगेडने केला. भुजबळांना वाडा देणे म्हणजे समतेला बदनाम करणे ब्रिगेडने छगन भुजबळ यांच्यावर थेट टीका करताना एका जुन्या घटनेची आठवण करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'रिडल्स इन हिंदूइझम' या पुस्तकावरील मोर्चानंतर भुजबळ यांनी मुंबईतील हुतात्मा चौक स्वच्छ केला होता. बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील वाईट प्रथा उघड केल्याने त्यांना ते पुस्तक 'वाईट' वाटले होते, असे ब्रिगेडने म्हटले. अशा व्यक्तीला महात्मा फुले वाडा देणे म्हणजे समता, बंधुता आणि विज्ञाननिष्ठ विचारांना बदनाम करण्यासारखे आहे, असा दावा संभाजी ब्रिगेडने केला. फुलेवाडा महाराष्ट्र सदन बनवू नका संभाजी ब्रिगेडने महात्मा फुले वाडा 'महाराष्ट्र सदन' बनवू नये, अशी भूमिका घेतली आहे. ज्या विचारांची सावली महात्मा फुलेंना नको होती, त्या वाईट प्रवृत्तींची सावली या पवित्र ठिकाणी पडू नये, असे ब्रिगेडचे म्हणणे आहे. हा वाडा सध्या पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून, तो तसाच ठेवावा आणि कोणत्याही पक्ष किंवा संघटनेच्या ताब्यात देऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पुरातत्त्व विभाग, महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिका हे या वाड्याचे संरक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत, असेही ब्रिगेडने स्पष्ट केले. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी इशारा दिला आहे की, सरकारने कोणत्याही दबावाला बळी न पडता चुकीचा निर्णय घेतल्यास संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन छेडेल. निवेदन सादर करताना प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे, पुणे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कोंढाळकर, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे, महादेव मातेरे, प्रीतम कोंढाळकर, जवाब दो आंदोलनाचे दत्तात्रय जाधव आणि संदेश दिवेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हिंगोली व कळमनुरी नगरपालिका निवडणुकीत मंगळवारी ता. २ सकाळपासूनच मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु झाली असून दुपारी दिड वाजे पर्यंत हिंगोलीत ३६.६८ टक्के तर कळमनुरीत ३९.७२ टक्के मतदान झाले आहे. हिंगोलीत मतदाराला निवडणुक चिन्ह सांगून गोपनियतेचा भंग केल्याच्या आरोपावरून आमदार संतोष बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.. हिंगोली नगर पालिकेच्या ३४ तर कळमनुरी नगर पालिकेच्या २० जागांसाठी मतदान घेतले जात आहे. हिंगोलीत ७८ तर कळमनुरीत २८ मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदानासाठी नागरीकांची गर्दी झाली होती. सकाळी मॉकपोलच्या वेळी काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे दिसून आले. यामध्ये हिंगोली शहरातील गणेशवाडी मतदान केंद्रावर मशीनचे बटन दबत नसल्याने मतदान यंत्र बदलण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी नागरीकांच्या रांगा दिसून आल्या होत्या. या शिवाय कळमनुरी येथे पाच ठिकाणी मशीन बदलण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवार व समर्थकांची कडाक्याच्या थंडीतही गर्दी झाली होती. दोन्ही ठिकाणी कुठेही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी संवेदनशील मतदान केंद्रावर राज्य राखीव दल तैनात करण्यात आले आहे. या शिवाय जिल्हयातील पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर तैनात केले आहेत. पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनीही सर्व मतदान केंद्रावर भेटी देण्यास सुरवात केली आहे. या शिवाय कुठेही अनुचीत प्रकार करणाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी दिल्या आहेत. दरम्यान, हिंगोली येथील एका मतदान केंद्रावर शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी महिला मतदारास मतदान चिन्ह सांगून गोपनियतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दिलीप चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संविधान मूल्यांचे संवर्धन आणि प्रतिष्ठा ही संकल्पना घेऊन प्रगतिशील साहित्य संमेलन २०२५ निमित्ताने खुल्या काव्य वाचन आणि कथा लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता गांधी भवन, म. गांधी स्मारक निधी केंद्र, विभागीय ग्रंथालयाजवळ, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर येथे या स्पर्धा होतील. काव्यवाचन आणि कथा लेखन स्पर्धेसाठी स्वतंत्रपणे प्रथम पारितोषिक प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख ११११, द्वितीय पारितोषिक प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख ७७७, तृतीय पारितोषिक प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख ५५५ तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असणार आहे. काव्यवाचन स्पर्धेसाठी नियम व अटी अशा... १) स्वलिखित एक कविता सादर करता येईल २) कवितेची वेळ तीन ते चार मिनिटे असेल ३) प्रवेश शुल्क शंभर रुपये राहील ४) कवींना २० डिसेंबर पर्यंत फोनवर नोंदणी अनिवार्य. कथा लेखन स्पर्धेच्या नियम व अटी अशा... १) तीन हजार शब्द मर्यादांपर्यंत स्वलिखित कथा असावी २) प्रवेश शुल्क शंभर रुपये राहील ३) कथा २० डिसेंबर २०२५ पर्यंत पीडीएफ व्हाट्सअप करावी किंवा हार्डकॉपी जमा करावी परीक्षकांचा निकाल अंतिम परीक्षकांचा निकाल अंतिम राहणार आहे. कथा लेखन आणि कविता वाचन स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते प्रगतिशील साहित्य संमेलनात केले जाईल, असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. येथे करा संपर्क स्पर्धेत सहभागी होण्यासाठी डॉ. दत्तात्रय डुंबरे ९८६०६१२११९, कवी सुनील उबाळे ९९७०१२१९१९, कवयित्री आशा डांगे ९७६४४५५५९७, कवी चक्रधर डाके ८२७५२३८४१३, कवयित्री सविता लोंढे ९४२३४०५५८१, कवयित्री माधुरी चौधरी ९४२१८६०८७३ आणि डॉ. समाधान इंगळे ९४२२२९४००२ यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या आधीच चर्चेत आहेत. मतदानाच्या अगोदरच रात्री पोलिसांनी नाकाबंदी केली, आणि त्या तपासणीत एका कारमधून दीड लाख रुपये रोकड जप्त झाली. हे वाहन भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याचे असल्याचे सांगितले जात आहे. अशी मोठी रोकड निवडणुकीच्या आधी सापडणे म्हणजेच मतदान प्रक्रियेला धक्का देणारी घटना, अशी प्रतिक्रिया अनेक पक्षांनी व्यक्त केली. या घटनेने संपूर्ण मालवणमध्ये राजकीय तापमान वाढवले आहे. या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी खूपच आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात राणे म्हणाले की, मतदानाआधी पैसे वाटप करण्याची योजना चालू होती, आणि ही कारवाई पकडली गेली आहे. मात्र, या प्रकारावर अजूनपर्यंत कोणतीही एफआयआर दाखल नाही, असा त्यांचा आरोप आहे. त्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या देत त्यांनी भाजप विरोधातील लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मतदार, कार्यकर्ते आणि प्रशासनाकडे त्यांनी सक्रिय कारवाईची मागणी केली. आज सकाळी निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर, नीलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधत सांगितले की, ही घटना माझ्या लक्षात आली होती, पण अहवाल अजून माझ्याकडे आला नाही. हा अहवाल सार्वजनिक केला पाहिजे. जे आरोपी आहेत, जे पैसे वाटपासाठी आले होते, ते आजही मोकाट फिरत आहेत. त्यांनी कोणतीही शिक्षा भोगली नाही. त्यांनी स्पष्ट केले की, जर योग्य कारवाई झाली नाही, तर ते न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत. निवडणूक आयोगालाही कोर्टात खेचणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. मतदान केंद्रांवर सुरक्षा वाढवण्याची मागणी या भयंकर आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर, मतदार आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मतदान करायला आलो होतो, पण अशा प्रकारच्या कारभारामुळे मतदानाची पवित्रता धोक्यात आहे, असे काही नागरिकांनी म्हटले. काही मतदान केंद्रांवर सुरक्षा वाढवण्याची मागणी केली गेली आहे. निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी आणि जनतेच्या मताच्या सुरक्षेसाठी या प्रकाराची तात्काळ चौकशी व निर्भिक कारवाई होणे गरजेचे आहे. प्रक्रिया पारदर्शक आहे का? सध्या पोलिसांनी कार जप्त केली असून तपास सुरू आहे; मात्र आरोपींवर अजूनपर्यंत FIR नाही, त्यामुळे पुढील कायद्याच्या मार्गाने कसे हाताळले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मालवणमधील ही घटना मतदारांना प्रक्रिया पारदर्शक आहे का? याकडे लक्ष वेधत आहे. आगामी काळात मतमोजणी, निवडणूक निकाल आणि त्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि प्रशासनिक कारवाई काय होतो? याकडे लक्ष लागले आहे.

25 C