शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक खरमरीत पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी भारतीय लोकशाहीच्या आरोग्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सत्ताधारी भाजपप्रणीत एनडीए सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच राष्ट्रपतींना विरोधकांकडे दुर्लक्ष करून सत्ताधाऱ्यांच्या हातचे टूलकिट न बनण्याचा गंभीर सल्ला दिला आहे. रशिन अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन नुकतेच भारताच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आले होते. त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. पण त्याचे निमंत्रण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी बाकावरील अनेक विरोधी पक्षनेत्यांना देण्यात आले नव्हते. यामुळे परदेशी पाहुण्यांच्या स्वागत समारंभ व स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला विरोधकांना निमंत्रित करण्याची देशाची परंपरा खंडीत पडल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून या प्रकरणी आपल्या पक्षाचा संताप व्यक्त केला आहे. सरकारच्या हातचे टूलकिट बनू नका प्रियंका चतुर्वेदी राष्ट्रपतींना उद्देशून आपल्या पत्रात म्हणाल्या, लोकशाहीत आपली भूमिका द्विपक्षीय(सत्ताधारी व विरोधक) आहे. घटनात्मक तत्वे जपण्याची आपली जबाबदारी आहे, यात सत्ताधारी व विरोधक या लोकशाहीच्या दोन्ही अंगांचा समावेश आहे. पण सरकारने विरोधी पक्षांना दूर ठेवण्यासाठी परदेशी मान्यवरांच्या स्वागतार्थ आयोजित केलेल्या सरकारी मेजवानीचे अपहरण केले ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. हे लोकशाहीसाठी चांगले संकेत नाहीत. यातून केवळ सत्ताधारी यंत्रणेची खोटी मानसिकता दिसून येते. त्यामुळे तुम्ही सरकारच्या हातातील टूलकिट बनू नका. असे झाले तर त्या माध्यमातून दशकानुदशकांपासून चालत आलेल्या रीतिरिवाज व परंपरा नष्ट होण्याचा धोका आहे, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या खुल्या पत्रात म्हटले आहे. परंपरा मोडणे म्हणजे लोकशाहीला खीळ घालणे उल्लेखनीय बाब म्हणजे या पत्राद्वारे प्रियंका चतुर्वेदी यांनी राष्ट्रपतींना एकप्रकारे निक्षुण सांगितले आहे की, राष्ट्रपती हे पद केवळ सत्ताधारी पक्षाचे नसून संपूर्ण देशाचे व संविधानाचे सर्वोच्च प्रतीक आहे. परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणारे राजकीय भोजन हे सर्वपक्षीय असते. त्यात विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रित करणे हे देशाची जुनी परंपरा आहे. ही परंपरा मोडणे लोकशाहीला खीळ घालण्यासारखे आहे. दरम्यान, सरकारच्या विरोधकांकडे साफ दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेवर अनेक विरोधी पक्षनेत्यांनी टीका केली आहे. पण प्रियंका चतुर्वेदी यांच्या या पत्रामुळे हा वाद आता थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे भविष्यात या मुद्यावरून देशभरात जोरदार राजकारण होण्याची शक्यता आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातून तिन्ही अल्पवयीन मुली रहस्यमयरीत्या गायब झाल्याची मोठी घटना समोर आली आहे. घरच्यांना टेक्निकल क्लासला जातो, असे सांगून या मुली घराबाहेर पडल्या; पण त्यानंतर परतच घरी आल्या नाहीत. त्यांना शेवटचं पाहिलं गेलं ते बसस्थानकात, आणि त्यानंतर त्यांचा कुठलाही ठावठिकाणा सापडलेला नाही. या घटनेमुळे सुनगाव परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. कोणत्याही प्रकारचा संपर्क न येता तीन मुली एकत्र बेपत्ता झाल्याने पालक आणि स्थानिक नागरिकात चिंता वाढली आहे. गायब झालेल्या मुली या तीघीही मैत्रिणी असून त्यांचे वय अंदाजे 16 वर्षे आहे. नियमितप्रमाणे त्या शिक्षणासाठी बाहेर पडल्या होत्या. काही मैत्रिणींनी त्यांना सकाळी जळगाव जामोद बसस्थानकात पाहिल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर त्या कुठे गेल्या, त्यांच्या हालचाली काय राहिल्या, याबाबत पोलिसांनाही कोणतीही माहिती मिळालेली नाही. यामुळे तपास आणखी गुंतागुंतीचा झाला असून, सर्वत्र शोधमोहीम सुरू आहे. मुली घरी न आल्याने पालक मोठ्या ताणात आहेत. पालकांनी मुली बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच ताबडतोब जळगाव जामोद पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तातडीने संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली. मात्र मुलींचा ठावठिकाणा मिळत नसल्याने हा तपास पोलिसांसाठी कठीण होत चालला आहे. यामध्ये जबरदस्तीने किंवा फुस लावून नेण्याची शक्यता पोलिसांच्या तपासात आढळल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन अल्पवयीन मुली एकत्र गायब होणे हा गंभीर सुरक्षेचा विषय असल्याने सर्व स्तरावरून लक्ष या तपासाकडे लागले आहे. मुलींनी आपापले बँक पासबुक सोबत घेतले यामध्ये आणखी एक माहिती समोर आली आहे. या तिन्ही मुलींना ज्या शाळेत शिकत होत्या, त्या शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या काही वर्तनावरील शंका आणि इतर कारणांमुळे पालकांना शाळेत बोलावले होते. ही माहिती मुलींना कळल्यावरच त्या अचानक घरातून बाहेर पडल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, तीनही मुलींनी आपापले बँक पासबुक सोबत घेतले. त्यामुळे त्यांनी घर सोडणे अचानक नव्हते, तर काहीतरी योजना करूनच हे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता अधिक मजबूत होते. मात्र नेमकं कारण काय? त्यांना कोणी फुस लावली का? त्या स्वयंस्फूर्तीने निघून गेल्या का? हे सर्व तपासून पाहिले जात आहे. 10 वर्षांच्या मुलीशी मुख्याध्यापकाचे अश्लील चाळे दरम्यान, बुलढाणा जिल्ह्याबरोबरच राज्यातही अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न चिंतेत टाकणारा आहे. कारण याच काळात गोंदिया जिल्ह्यातदेखील एक घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. गोंदिया तालुक्यातील दवनीवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे की, पाचवीत शिकणाऱ्या केवळ 10 वर्षांच्या मुलीशी शाळेच्याच मुख्याध्यापकाने अनेक महिन्यांपासून अश्लील चाळे केले. मुलीच्या वर्तनातील बदल पालकांच्या लक्षात येताच त्यांनी चौकशी केली, आणि धक्कादायक सत्य बाहेर आलं. पोलिसांनी 47 वर्षीय आरोपी ओमप्रकाश पटले याला विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे. या घटनेमुळेही शिक्षण संस्थांमधील सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शहरातील मास्टर कॉलनीत घरापासून हाताच्या अंतरावर अकरा केव्ही क्षमतेची उच्च दाबाची वीज वाहिनी आहे. घरातील सांडपाण्याच्या पाइपाची लोखंडी सळईने साफसफाई करताना या वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने मौलाना साबीर खान नवाज खान पठाण (वय 43) व त्यांची मुलगी आलियाबी साबीर खान (वय 12) या दोघांचा मृत्यू झाला. तर मौलाना यांची दहा वर्षीय भाची अत्यवस्थ आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. सन 2018पासून ही धोकादायक वीजवाहिनी हटवण्याची मागणी या भागातून करण्यात येते आहे. मात्र, त्याकडे महावितरणने दुर्लक्ष केले. त्यामुळे हे दोन निष्पाप बळी गेले अशी लोकभावना आहे. घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात येईल, या परिसराचा सर्व्हे करण्यात येईल आणि वीज वाहिनीचे स्थलांतर आठ दिवसात करण्यात येईल, तसेच विद्युत निरीक्षकांच्या अहवालानंतर मृतांच्या वारसांना दोन महिन्यात तत्काळ मदत देण्यात येईल, हे लेखी आश्वासन घेतल्यानंतरच शवविच्छेदन करून तीन तासांनी जीएमसी रुग्णालयातून दोन्ही मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतले. दरम्यान, मृतांच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने नागरीक सहभागी झाले होते.त्यामुळे नेरीनाका ते अजिंठा चौफुली परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. मास्टर कॉलनीत राहणारे तथा रजा मशिदव मदरसा येथे धार्मिक शिक्षण देणारे साबीरखान हे लहानपणापासून या रजा मदरसा येथे शिक्षण घेवून 2008 पासून येथे मौलाना म्हणून मुलांना धर्मशिक्षण देत होते. ते मुबीन शेख अजिज यांच्या मास्टर कॉलनीतील घरात पहिल्या मजल्यावर वास्तव्यास होते. शुक्रवारी सव्वादहा वाजेच्या सुमारास त्यांची मोठी मुलगी आलियाबी ही गॅलरीत असलेल्या सांडपाणी वाहून जाण्याचा पाइप चोकअप झाल्याने त्यात सुमारे 8 ते 10 फुट लांबीची लोखंडी सळईच्या मदतीने चोकअप काढत होती. सळईचे दुसरे टोक गॅलरीच्या जवळून जाणाऱ्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीवरील प्लास्टीक पाइपावर पडून त्यातून वीजप्रवाह अलियाबीच्या हातातून शरीरात प्रवेशित झाल्याने ती गंभीर भाजली केली. या वेळी मदरशात जाण्यासाठी तयार होत असलेले मौलाना साबीर यांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली असता, त्यांनाही वीजेचा जोरधार धक्का बसला. दोघेही फेकले जावून पडल्याने दोन दिवसांपासून मदरशात शिक्षण घेण्यासाठी अजिंठा येथून आलेली मौलाना यांची भाची फातेमा अजिम पठाण (वय 10) हीनेही मौलाना यांना सोडवण्याचा प्रयत्न केला असता तीही गंभीर भाजली. या तिघांना खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांना मौलाना साबीर व त्यांची मुलगी आलियाबी यांना मृत घोषित केले. त्यानंतर दोघांचे मृतदेह जीएमसी रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर मास्टर कॉलनीसह मेहरुण व शहराच्या विविध भागातून लोकांना जीएमसी रुग्णालयात गर्दी केली. मृत साबीर यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगी उलफिया (वय 10) व मुलगा अली (वय 7) असा परिवार आहे. महावितरणसोबत शिष्टमंडळाची चर्चा या दुर्घटनेला जबाबदार कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, उच्चदाब वीज वाहिनीचे शिफ्टींग करावे, निवासी भागातील सर्व वायरिंग कव्हर करावी. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत देण्यात यावी, गंभीर जखमीच्या उपचाराचा सर्व खर्च व भविष्यांसाठी नोकरी उपलब्ध करुन द्यावी, मेहरुण परिसरातील संपूर्ण सदोष वीज वाहिन्यांचा सर्व्हे करण्यात यावा या पाच मागण्यांचे निवेदन समाजाच्या शिष्टमंडळातर्फे महावितरणच्या अधिकाऱ्यांना देऊन त्यावर चर्चा करण्यात आली. 2018 मध्येही गेला दोघांचा बळी ज्या ठिकाणी शुक्रवारी दुर्घटना घडली त्या घरापासून शंभर फुटावर या उच्च दाब वीजवाहीनीमुळे दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. 6 जून 2018 रोजी वीज वाहिनी तुटून पडून अक्सानगरात राहणारे इमरान शेख फैय्याद (वय 35) व इमरान इमाम शेख(वय 30) या दोघां रिक्षात बसलेल्या तरुणांचा भाजून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर या परिसरातील नगरसेवक रियाज बागवान यांनी महावितरणला निवासी वस्तीला लागून असलेली ही उच्चदाब वीजवाहिनी समोरील बाजार समितीच्या भितींच्या बाजूला हलवण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी परिसरात भेट देवून पाहणी केली होती. वीज वाहिनी स्थलांतराचे तोंडी आश्वासन तेव्हा मिळाले होते. परंतु त्यानंतर कुठलीही ठोस कारवाई झाली नाही. ती झाली असती तर ही दुर्घटना घडली नसती. वीजवाहिनी 60 वर्षे जुनी, घरे त्यानंतर बांधली गेल्याचा दावा मास्टर कॉलनी परिसरात घडलेल्याघटनेनंतर आमदार सुरेश भोळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. परिसरात अनेकवर्षांपासून सर्व्हे झालेला नाही. परिसरातील नागरिकांनी वीजतारा घरांच्या जवळ व लोंबकळत असल्याने महावितरणने उपाययोजना कराव्या याबाबत अनेकदा निवेदने दिली आहेत. मात्र दखल घेतली गेली नाही. शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर महापालिका व महावितरण बैठक घेऊन एकत्रितरित्या सर्व्हे करण्याबाबत निर्णय घेणार आहे. दरम्यान या परिसरात 60 वर्षांपेक्षा अधिक जुन्या वीजवाहिन्या आहेत.त्यानंतर बांधकाम करण्यात आल्याचा दावा केला जातो आहे. यामुळे वीजवाहिनी शिफ्टिंगची प्रक्रिया झालेली नाही. या ठिकाणाहून 11 केव्हीची लाइन गेलेली असून या ठिकाणी सर्व्हे करून वायरिंगची समस्या सोडवली जाऊ शकते. मृताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे 40 हजार रुपये देण्यात येणार असून याबाबत कुटुंबीयांकडून वारसांची नावे घेण्याची प्रक्रिया सुरु आहे असे महावितरणकडून सांगण्यात आले. लेखी आश्वासन दिले फातेमाची प्रकृती गंभीर, उपचार सुरू मौलाना साबीर खान यांची भाची फातेमाला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. तिची प्रकृती अंत्यंत गंभीर आहे असे डॉ. एम. डब्ल्यू पटेल यांनी शुक्रवारी रात्री दहा वाजता ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. दिव्य मराठी पॅरलल इन्व्हेस्टीगेशन घटनेची माहिती मिळताच येथील रहिवासी, एमआयडीसी पोलिसांनी घराच्या दुसऱ्या मजल्यावर धावघेतली. मृत मुलीच्या हाताजवळएक सळई त्यांना दिसली. हातातील सळईने ती पाइपातील घाण साफ करण्याचे काम करत असताना वाकलेल्या सळईची दुसरी बाजु थेटघरासमोरील विजतारांना टेकली. यातारांत प्लास्टीकच्या पाइपांचे आवरण होते. दाबामुळे प्लास्टीक वितळून सळई व विजतारांचा संपर्क झाला. क्षणार्धात हा प्रवाह मुलीच्या दोन्ही हातातून आत गेला व डाव्यापायातून जमिनीच्या मार्गाने बाहेर पडला. ज्यामुळे डाव्या पायाचा अंगठा भाजून वेगळा झाला. अशाअवस्थेत ती काही वेळ पडून होती. या भागातील वीजपुरवठा खंडीत केल्यानंतर पोलिस, रहिवाशांच्या मदतीने तिच्यासह लगेच तिघांना रुग्णालयात नेण्यात आले. तिच्या या अवस्थेतील 46 सेकंदाचा व्हिडीओ एका पोलिस कर्मचाऱ्याने पुढील तपासासाठी चित्रीत केला आहे. हा व्हिडीओ ‘दिव्य मराठी’कडे उपलब्ध आहे. हातातील लोखंडीसळईमुळे तीचा जीव गेल्याची शक्यता या फोटो, व्हिडीओ चित्रणातून व्यक्त होते आहे. घराच्या गॅलरीसमोर, छतावरून वीजवाहिनी गेली असेल तरतिला लोखंडी वस्तूचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.जेणेकरून विजेचा शॉक लागून होणारी दुर्घटना टाळता येईल. अधिवेशनात प्रश्न मांडू : भोळे घटनेची माहिती मिळाल्यावर शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जावून मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली.महावितरण कपनीचे वरिष्ठ अधिकारी आल्यावर आमदारांनी त्यांना फटकारले. शिष्टमंडळाने महावितरणच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आमदारांनी बैठकीत उपस्थिती देऊन मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. तसेच हा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन दिले.त्यानंतर येथील तणाव निवळला. आठवडाभरात विद्युत निरीक्षक अहवाल सादर करणार मास्टर कॉलनी परिसरात घडलेल्या घटनेबाबत विद्युत निरीक्षकांना कळवण्यात आले आहे. त्यांच्याकडून तपासणी होऊन आठवडाभरात अहवाल सादर केला जाईल. यानंतर दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. - दत्तात्रय साळी, कार्यकारी अभियंता, महावितरण, जळगाव
देशात सध्या हिवाळा ऋतू सुरू असला तरीही महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात मात्र हवामानाचे विचित्र रंग पाहायला मिळत आहेत. सध्या उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून, शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी पंजाबच्या अदमपूर इथं मैदानी भागात देशातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. जिथं पारा 2 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. तर कर्नाटकातील होनावर इथं देशातील उच्चांकी अर्थात 35.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. महाराष्ट्रात मात्र सध्या आलेली थंडीची लाट काही अंशी ओसरताना दिसत आहे. महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये किमान तापमानात वाढ झाल्यामुळं थंडीची लाट ओसरून गारठा काहीसा कमी झाला आहे. पहाटेची वेळ यास अपवाद ठरत असून, यादरम्यान मात्र गारठा जाणवत आहे. मात्र आकाश निरभ्र होऊन कमाल तापमानात चढ-उतार होत असल्याचं लक्षात येत आहे. आठवड्याचा शेवट तुलनेनं कमी गारठ्यानं होणार असला तरीही पुढच्या 48 तासांमध्ये मात्र किमान तापमानात पुन्हा एकदा हळूहळू घट होत गारठा वाढण्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे येथील घाटमाथ्यांवर थंडीचा हलका स्पर्श प्रत्यक्षात गारठा कमीजास्त होत असला तरीही सातारा, कोल्हापूर, पुणे येथील घाटमाथ्यांवर धुक्याची दुलई आणि गुलाबी थंडीचा हलका स्पर्श जाणवत आहे. मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची ही स्थिती कायम राहणार असून, धुळे आणि निफाड इथं अनुक्रमे 8.6 अंश आणि 9.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवामानाची ही स्थिती कायम मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवामानाची ही स्थिती कायम राहणार असून, सूर्य मावळतीला जात असताना बहुतांश भागांमध्ये आभाळात निसर्गाचा एक वेगळाच चमत्कार पाहता येईल. दिखं विविध रंगांच्या छटांनी आभाळ व्यापून जाईल आणि थंडीच्या या दिवसांमध्ये निसर्गाचं हे वेगळं रुप पाहता येईल. समुद्रावर तयार होणारे वारे, उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि दक्षिणेकडे तयार होणारा कमी दाबाचा पट्टा पाहता या साऱ्याचा एकत्रित परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसणार आहे.
घृष्णेश्वर मंदिराच्या परिसरात ६५ वर्षांपूर्वी जगद्गुरू श्री संत जनार्दन स्वामी आश्रम स्थापन झाला. याच पावन भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांच्या समाधींचा ऐतिहासिक वारसा जतन केलेला आहे. याच परिसरात एकीकडे शहाजी महाराजांची गढी, तर दुसरीकडे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वर मंदिर आहे. या ठिकाणी ५० एकर जागेत देशभरातील शूरवीरांचा इतिहास, संतपरपंरा अन् जनार्दन स्वामींच्या कार्यावर आधारित मौनगिरी सृष्टी साकारणार आहे. यात २९० कोटींचा आराखडा तयार केला आहे. प्रकल्पाचे भूमिपूजन सप्टेंबर महिन्यात झाले असून हा प्रकल्प पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जगद्गुरू श्री संत जनार्दन स्वामी (मौनगिरी महाराज) यांचा जन्म दहेगावच्या पाटील घराण्यात २४ सप्टेंबर १८३६ रोजी झाला. श्रीक्षेत्र नागेश्वर (ता. अंदरसूल) येथे ते तपश्चर्या, अध्ययनासाठी मंदिरात होते. त्यांचे देहावसान १९८९ मध्ये झाले. आता जगद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराज उत्तराधिकारी म्हणून आहेत. त्यांच्या संकल्पनेतून मौनगिरी सृष्टी साकारली जात असल्याचे वास्तुविशारद महेश साळुंके यांनी सांगितले. पर्यटनस्थळ उभारण्याचा मानस- शांतीगिरी महाराज, श्री जनार्दन स्वामी आश्रम बाबाजींचे चरित्र दर्शनातून प्रेरणा, उमंग निर्माण करणे हा उद्देश आहे. जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ निर्माण करणे आहे. यातून संतांचा इतिहास समजणार आहे. ५ कोटींतून कामे प्रगतिपथावर- राजेंद्र पवार, प्रकल्प समन्वयक, मौनगिरी सृष्टी मौनगिरी सृष्टीसाठी २९० कोटी लागणार आहेत. शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा होत आहे. सध्या कामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात भक्तनिवास, पार्किंग, शिल्पे बसवली जाणार आहेत.
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजनात साधू-महंत, आखाडे, सरकार यांची भूमिका तर अनिवार्य आहे. याच बरोबरीने सामान्य नाशिककरही कुंभमेळ्याशी जोडला जावा, रोजगार-स्वयंरोजगाराच्या विविध संधी, व्यवसायासाठी अर्थसहाय्य आणि नियोजनातला सहभाग वाढविण्याच्या दृष्टीनेही आम्ही नियोजन सुरू केल्याचे कुंभमेळा प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा मेळा आयुक्त शेखर सिंहयांनी स्पष्ट केले. ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या सदिच्छा भेटीत सिंह यांनी कुंभमेळा आयोजन, नियोजन आणि व्यवस्थापनासह सध्याच्या विकास कामांबाबत सर्वच बाबींवर मोकळा संवाद साधला. तो त्यांच्याच शब्दात.. Q : सिंहस्थातून रोजगारवाढीसाठी प्रशासनाचे काही नियोजन आहे का? A : आम्ही पंचतारांकित हॉटेल्सपासून ते होम-स्टे सुविधा देणाऱ्यांनाही प्रशिक्षण देणार आहोत. गाइड, रिक्षाचालक आणि येणाऱ्या भाविकांच्या आदरतिथ्यासाठी जे जे घटक प्रत्यक्ष संबंधित असतील असे सर्वांना प्रशिक्षण देऊ.नाशिककरांमध्ये सॉफ्ट स्किल अन् कौशल्य विकसित करण्याचे नियोजन आहे. यातून रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. यादृष्टिकोनातून रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. Q : नाशिकचा विकास कुंभमुळेच होतो, कुंभनंतर कुठला रोडमॅप आहे? A : नक्कीच, दर 12 वर्षांनी येणारा कुंभ हा नाशिकच्या विकासाची एकपर्वणीच असते हा इतिहास सांगतो. यंदाही आपण पायाभूत सुविधा त्यात शहरांतर्गत रस्ते, बाह्य रस्ते, रिंगरोड,इतर शहरांना जोडणारे रस्ते, पाणीपुरवठा क्षमता वाढ, एसटीपी प्रकल्पाची क्षमता वाढ, स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक प्रकल्पांची उभारणी करत आहे. रामकालपथ, त्र्यंबकेश्वरला दर्शन पथ, पर्यटनीय स्थळांवर क्रीडा-मनोरंजनाच्या बाबींच्या उपलब्धतेतून पर्यटन वाढू शकेल यातून अर्थार्जन कसे होईल यासाठी प्रयत्न करत आहोत. Q : कनेक्टिव्हिटीमध्येसुसूत्रतेसाठी कुंभच्या निमित्ताने नियोजन काय? A : हो नक्कीच.. मुंबई-पुण्यानंतरआता सर्वाधिक विकास क्षमतानाशिकमध्ये आहे. नाशिकमधूनसुरत-चेन्नई, समृद्धी महामार्ग,वाढवण बंदर (तवा) तेनाशिक-समृद्धी जोड रस्ता जातआहे. या सर्व रस्त्यांचा नाशिकच्याभविष्यातील विकासासाठी अत्यंतमहत्त्वाचा वापर कसा करता येईल.या दृष्टीने कुंभतील कामांचेनियोजनही करत आहोत. शिवायहवाई सुविधा नियमितउपलब्धतेसाठी नियोजन केले जातअसून विमानतळ विस्तारीकरणयानिमित्त होत आहे. Q : सिंहस्थातील कामे, विविधसुविधांचा नाशिककरांना कसाउपयोग होईल? A : एमआरओ सुरू झाले आहे. आताकार्गो, नाइट हॉल्ट या सुविधाही उपलब्ध होणार आहेत. रेल्वे कनेक्टिव्हिटी अन् विविध ठिकाणी रेल्वे थांबे उभारत आहोत.सिंहस्थानंतरही या सुविधांचा नाशिकच्या विकासासाठी उपयोग होईल. या सोहळ्याच्या यजमानपदातून प्रत्येक नाशिककरांना योग्य लाभ व्हावा यासाठी प्रशासन कटिबद्ध असेल.रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी सुरू करण्यात येणाऱ्या व्यवसायासाठी आवश्यक अर्थपुरवठाही शासकीय योजना, संस्थांमार्फत कसा करतायेईल यादृष्टीने विचार सुरू आहे. Q : नाशिककरांना कुंभचा नेमका कसा फायदा होणार? उत्तर : कुंभाचे यजमान असलेल्याना शिककरांना लाभ व्हावा यादृष्टीने नियोजन सुरू आहे. त्यात फाइव्ह स्टार हॉटेल्सपासून ते स्टे-होम सुविधा देणाऱ्यांनाही हॉस्पिटॅलिटी अर्थात आदरातिथ्याचे प्रशिक्षण देत सर्वांमध्ये एक समानता आणि एक सूर कसा असेल यादृष्टीने नियोजन करतो आहे. नाशिकचे ब्रँडिंग केले जाईल. यातून भाविकांसह पर्यटकांचीही संख्या वाढताना अर्थार्जनाची संधी वाढेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वाहिलेलं भव्य स्मारक मुंबईतील इंदू मिल परिसरात उभारले जात आहे. या स्मारकाचे बांधकाम जलद गतीने सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी माहिती दिली की, पुढील महापरिनिर्वाण दिनाच्या आधी म्हणजेच डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी येत्या पावसाळ्यापूर्वी पुतळ्याचे मोठे स्ट्रक्चर तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करून ही माहिती दिली. या स्मारकाचे महत्त्व सांगताना त्यांनी सांगितले की, सध्या 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. सर्वात मोठे आणि तांत्रिक काम म्हणजे पुतळ्याची उभारणी आहे. या पुतळ्याचा पाया जवळपास 100 फूट उंचीचा असणार आहे आणि त्यावर 350 फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभा राहणार आहे. हा पुतळा उभा झाला की, मुंबईच्या आकाशात तो दूरूनही दिसेल असा भव्य आकार याला असेल. पूर्ण स्मारक हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक रचनेसह उभारले जात आहे. फडणवीस यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, भारतात पूर्वी सामाजिक विषमता खूप होती. अनेकांना मानव म्हणूनही वागणूक दिली जात नव्हती. त्या वेळी बाबासाहेबांनी मोठा संघर्ष केला. त्यांनी शिक्षण मिळवलं, ज्ञान वाढवलं आणि समाजाला उठवून उभं केलं. सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी त्यांनी भारताचे संविधान बनवलं. त्यांनी जात-धर्म बाजूला ठेवून प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिला. त्यामुळेच भारताच्या प्रगतीची पायाभरणी झाली. पुढील महापरिनिर्वाण दिनी या स्मारकाचे लोकार्पण हे स्मारक उभारताना बाबासाहेबांच्या विचारांची आणि संघर्षाची आठवण सर्वांना होईल, अशी सरकारची इच्छा आहे. हे स्मारक केवळ एका समाजापुरते नाही, तर सर्व भारतीयांसाठी आहे. सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि मानवतेचा संदेश हे स्मारक पुढील पिढींना देणार आहे. त्यामुळेच या स्मारकाचे बांधकाम वेळेवर आणि उत्तम गुणवत्तेत करण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही अडचणी न आल्यास पुढील महापरिनिर्वाण दिनी या स्मारकाचे लोकार्पण करता येईल. मुंबईच्या पर्यटनातही नव्या आकर्षणाची भर सरकार आणि बांधकाम विभागाकडून काम वेगाने सुरू आहे. आर्थिक तरतूद, तांत्रिक साधने, कामाचे नियोजन आणि सुरक्षा लक्षात घेऊन बांधकाम सुरू आहे. मुंबईतील महत्त्वाचा प्रकल्प असल्यामुळे लोकांचेही लक्ष या कामाकडे आहे. नागरिकांमध्येही या स्मारकाबद्दल मोठी उत्सुकता आहे. आगामी काही महिन्यांत पुतळ्याचे स्वरूप आणि स्मारकाचा अंतिम टप्पा स्पष्ट होणार आहे. हे स्मारक पूर्ण झाल्यावर मुंबईच्या पर्यटनातही नव्या आकर्षणाची भर पडेल. आंबेडकरांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून समाजाला दिशा देणारे प्रेरणास्थान राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
गोमांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या एका प्रवासी रिक्षाला (एमएच-२० ईएफ ७०२३) गोरक्षकांनी शुक्रवारी (५ डिसेंबर) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास विटावा फाट्यावर पकडले. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. विशेष म्हणजे, घटनेची माहिती मिळूनही पोलिस तब्बल एक तास उशिरा घटनास्थळी पोहोचल्याने गोरक्षकांचा संताप वाढला आणि त्यांनी रस्ता रोखून धरला, ज्यामुळे परिसरातील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. अंबेलोहळ परिसरातून गोमांसाच्या गोण्या घेऊन ही रिक्षा शहराकडे येत होती. विटावा फाट्याजवळ गोरक्षकांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने हुलकावणी देत रिक्षा पुढे नेली. गोरक्षकांनी पाठलाग करून रिक्षा अडवली. रिक्षामध्ये हबीब हाशम शेख (३८) आणि कमरू जलाल सय्यद (५६) ही महिला आढळली. संतप्त गोरक्षकांनी रिक्षाचालकाला चोप दिला आणि रिक्षातील गोमांसाच्या गोण्या रस्त्यावर फेकून देत रस्त्याच्या मधोमध वाहतूक रोखून धरली. पोलिस उशिरा, रोष वाढला पोलिस तासाभरानंतर घटनास्थळी दाखल झाल्याने गोरक्षकांचा रोष शिगेला पोहोचला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून त्वरित ११२ च्या व्हॅनने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात हलवले. अवैध गोमांस विक्री, वाहतूक आणि कत्तलखान्यांवर कारवाई करू या वेळी गोरक्षकांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी अंबेलोहळ येथील अवैध कत्तलखान्यावर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत रस्ता मोकळा करणार नाही, असा पवित्रा घेतला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन, पोलिसांनी थेट पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्याशी संपर्क साधला. उपायुक्त अतुलकर यांनी अवैध गोमांस विक्री, वाहतूक आणि कत्तलखान्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ठोस आश्वासन दिले. या आश्वासनानंतरच जिल्हा गोरक्षक प्रमुख गणेश शेळके, अमित सिंग, विश्व हिंदू परिषदेचे अभिषेक माने यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आपला रास्ता रोको मागे घेतला. पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अवैध गोवंश वाहतुकीचा प्रश्न पुन्हा आला ऐरणीवर शहरात गेल्या दोन महिन्यापासून गोवंश वाहतूक करणाऱ्या व गोरक्षकामध्ये सातत्याने संघर्ष निर्माण होत आहे. ७ ऑक्टोबरला चिकलठाणा भागात गणेश शेळके या गोरक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्याच्या काही दिवसांनंतर त्यांचे वकील सुभाष बोडखे यांच्यावरदेखील टोळक्याने हल्ला चढवला होता. गेल्या काही दिवसांत पोलिसांच्या कारवाईपेक्षा गोरक्षकांनी गोवंश व गोमांस पकडून दिले आहे. या वादातून विपरीत घडण्याची शक्यता असूनदेखील पोलिसांच्या कारवाई थंड बसत्यात असल्याने शंका निर्माण होत आहे.
उत्तम शिक्षण आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधील उज्ज्वल करिअर असलेल्या एका उच्चशिक्षित विवाहित तरुणीच्या आयुष्यातील स्वप्नभंगाची वेदनादायक कहाणी समोर आली आहे. 13 मे 2018 रोजी विवाहबद्ध झालेल्या या विवाहितेच्या वैवाहिक जीवनात, लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या सासरच्या मंडळींना लागलेल्या पैशाच्या हव्यासाने कसा कहर केला, याचे हे प्रकरण आहे. छळाला कंटाळून अखेर पीडितेने छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन पतीसह सासू-दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. टेंडरसाठी पत्नीवर पैशाचा दबाव पीडितेचा पती करुणासागर धर्मराज मोरे (व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर) याला शासकीय टेंडर्स भरायची होती. यासाठी त्याला मोठ्या रकमेची गरज भासू लागली. या गरजेपोटी पतीने आपल्या पत्नीलाच ‘कॅश काउंटर’ बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. “टेंडरसाठी तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ये,’ असा सतत तगादा लावून पतीकडून तिचे मानसिक आणि भावनिक शोषण केले जात होते. पतीच्या बोलण्यातून प्रेम आणि आपुलकीचे शब्द पूर्णपणे संपले होते. त्या जागी फक्त पैशाचा दबाव आणि शिवीगाळ उरली होती. थरकाप उडवणारा दिवस छळाची ही कहाणी 10 ऑगस्ट 2025 रोजी पुण्यात, हडपसर येथील गंगा रेसिडेन्सीत, एका टोकावर पोहोचली. त्या दिवशी दुपारी पती करुणासागरने कोणताही वाद नसताना पत्नीला आणि तिच्या लहान मुलीला मारहाण केली. रागाच्या भरात त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. सासरी मानसिक छळ : टोमणे, अपमान आणि पैशासाठी मारहाण जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील मॉडर्न सोसायटीत राहणाऱ्या सासरच्या मंडळींकडून पीडितेला मानसिक छळ सहन करावा लागला. सासू आणि दीर राहुल मोरे हेदेखील पीडितेला कोणत्याही प्रकारचा आधार देण्याऐवजी सतत अपमानित करत होते. “शिक्षण आहे, नोकरी आहे, पण घरात शांती नाही’ यांसारखे बोल आणि टोमणे तिला रोज ऐकावे लागत होते. पतीच्या पैशाच्या हव्यासाला या मानसिक छळाची जोड मिळाली. पैसे न दिल्यास पतीकडून तिला मारहाण केली जात असे. एवढेच नाही, तर तिने साध्या कामाची विचारणा किंवा चौकशी केली तरी तिला अपमानित करण्यात येत होते. असे तक्रारीत नमूद आहे.
अवैधसावकारीच्या जाचाला कंटाळून बेलुराखुर्द (ता.पातूर) येथील शेतकरी गोपाल वामनराव पाटेखेडे (वय 38) यांनी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आपल्या भावाच्या आत्महत्येस अकोला शहरातील सावकार राकेश भूपेंद्र गांधी (वय45, धंदा- सावकारी, सचिन उर्फबंटी अरुण खरळ (धंदा-सावकारी) व दिलीप आप्पाराव देशमुख (वय 57 सर्व रा.अकोला) तथा संतोष बळीराम सावंत (रा. पातूर) जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार मृतक गोपाल पाटखेडेचा भाऊ नागेश वामनराव पाटखेडे यांनी पातूर पोलिसांत 28 नोव्हेंबर 2025 रोजी केली. त्यावरून पातूर पोलिसांनी 4 डिसेंबर रोजी आरोपी राकेश भूपेंद्र गांधी तथा सचिन उर्फ बंटी अरुण खरळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने सत्य समोर फिर्यादीचा भाऊनागेश वामनराव पाटखेडे यानेमृतक गोपाल पाटखेडे याचा मोबाइल 27 नोव्हेंबर 2025 रोजी पाहिला असता मृत्यूपूर्वी पंधरा मिनिटे आधी मृतक गोपाल पाटखेडेयांनी स्वतःच्या मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचे दिसून आले. या व्हिडीओमध्ये राकेश भूपेंद्र गांधी यांच्याकडून 20 टक्क्यानेआपण व्याजाने पैसे घेतले होते. हे पैसे व्याजासह दिल्यानंतरही राकेश भूपेंद्र गांधी व सचिन उर्फ बंटी अरुण खरळ यांनी जीवास धोका पोहोचू, अशी धमकी देऊन जबरदस्तीने बेलोरा खुर्द (ता.पातूर) येथील शेत सर्वे नंबर 72 क्षेत्रफळ 1 हेक्टर37 आर पैकी 40, आर जमीनरजिस्टर दस्त क्रमांक 5159 /2025 नुसार सावकारीमध्ये खरेदी नोंदवूनघेतली. खरेदी नोंदवत असताना दिलीप आप्पाराव देशमुख, संतोष बळीराम सावंत यांनी सहकार्य केले. भावाने संपूर्ण रक्कम दिल्यानंतरही भावाजवळून जबरदस्तीने शेताची खरेदीकरून घेतली. संपूर्ण पैसे परत देऊनही तसेच खरेदी करून घेतल्यानंतरही आठ लाख रुपयांची मागणी करत होते. त्यामुळे त्याला जगणे नकोसे झाले, असे व्हिडिओत म्हटले आहे. याबाबत समन्वय समितीच्या पदाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी समन्वयचे समितीचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर, सचिव डॉ.अविनाश बोर्डे, विजय ठोकळ, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, कास्ट्राईबचे शशिकांत गायकवाड, राजकुमार वानखडे, शिक्षक सेनेचे देवानंद मोरे यांच्यासह विलास खुमकर, दिनेश तायडे,विमाशिचे प्रविण लाजूरकर संस्थाचालक संघटनेचे ॲड.विलास वखरे, विजयराव कौसल,मारोती वरोकार, प्रा. नरेंद्र लखाडे,उर्दू शिक्षक संघटनेचे हमीद, दिव्यांग शिक्षक संघटनेचे संजय बरडे,ॲक्शन फोर्सचे, पुंडलिक भदे आदी होते. माया लेकराले वावरं कुठून देऊ मी आत्मत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओत गोपाल पाटखेडे म्हणतात.. की ‘यादोघा सावकारांकडून व्याजाने घेतलेले पैसे मी पूरेपूर परत केले.तरी ते वावर देत नाही, ते विकून टाकतो, असे म्हणतात. आणखी आठ लाख रुपये मागत आहेत. एवढे पैसे मी कुठून देऊ.. मायालेकराले वावरं कुठून देऊ मी.आता जगून काही अर्थ नाही मरावे लागते. दोघा आरोपींचा शोध सुरू बेलुरा खुर्द येथील शेतकरी गोपाल पाटखेडे याच्या आत्महत्येप्रकरणी अकोला शहरातील सावकार राकेश भूपेंद्र गांधी व सचिन उर्फ बंटी अरुण खरळ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध आहे.- हनुमंत डोपेवाड, ठाणेदार,पातूर पोलिस स्टेशन.
नांदेडमध्ये घडलेल्या सक्षम ताटे हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आंतरजातीय प्रेमसंबंधांतून एका तरुणाचा जीव गेला असल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. सक्षम आणि आचल मामीडवार यांचे प्रेमसंबंध कुटुंबीयांना मान्य नसल्यामुळे ही हत्या घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर सक्षमच्या कुटुंबीयांना तसेच आचललाही जीवाची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे संरक्षण देण्याची मागणी सतत होत होती. अखेर, पोलिस प्रशासनाने पुढाकार घेत सक्षमच्या कुटुंबाला आणि आचलला सशस्त्र सुरक्षा उपलब्ध करून दिली आहे. 27 नोव्हेंबरच्या रात्री ही घटना घडली. सक्षम ताटे यांच्या घराजवळ आरोपींनी गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर फरशीने डोक्यात वार करत त्यांची निर्दयीपणे हत्या केली. सक्षम ज्या घरात राहत होता, त्याच परिसरात आचल मामीडवारचे कुटुंबही राहते. या प्रकरणात आचलच्या वडिलांसह तिची आई, दोन भाऊ आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. इतवारा पोलिस ठाण्यात सर्व आरोपींवर हत्या आणि प्रतिबंधक कायद्यांतर्गत कठोर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी आधी केलेल्या तपासात आचलच्या भावाने मित्रासह सक्षमच्या घराची रेकी केली असल्याचेही सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही हत्या पूर्ण नियोजन करून घडवून आणल्याचे दिसते. सध्या सर्व आरोपी पोलिस कोठडीत असून तपास अधिक गतीने सुरू आहे. सक्षमच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंब अत्यंत धास्तावलेल्या अवस्थेत आहे. मुलीच्या कुटुंबाकडून पुन्हा हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता कुटुंबीय आणि सामाजिक संघटनांनी वर्तवली होती. त्यानंतर पोलिस प्रशासनाने तातडीने पावले उचलली. सक्षमच्या संघसेननगर येथील घरासमोर सहा शस्त्रधारी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दोन-दोन पोलीस कर्मचाऱ्यांची चार तासांच्या अंतराने पाळी ठेवून 24 तास अखंड सुरक्षा देण्यात येणार आहे. फक्त घरासमोरच नव्हे, तर परिसरातही नियमित गस्त वाढवण्यात आली आहे. सक्षमच्या कुटुंबाची सुरक्षितता ही पोलिसांची जबाबदारी असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आचल मामीडवारलाही संरक्षणाची गरज होती. तिचे कुटुंब आता आरोपी असल्याने ती एकटी पडली आहे. तिला मानसिक धक्का बसला आहे. सक्षमच्या मृत्यूने ती हादरली असून तिचाही जीव धोक्यात असू शकतो, असे संघटनांचे मत होते. पोलिसांनी हे लक्षात घेऊन आचलसाठीही स्वतंत्र सुरक्षा टीम नियुक्त केली आहे. तिच्या राहत्या ठिकाणी पोलिस सतत उपस्थित राहतील, तिच्या हालचालींवर देखील लक्ष ठेवले जाणार आहे. आचल सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे तिच्या सुरक्षेबरोबरच मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचीही गरज असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. समाजात जातिवाद अजूनही खोलवर या घटनेमुळे नांदेड शहरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरजातीय प्रेमसंबंधांना विरोध करत जीवघेणे हल्ले होण्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांत भयाचे सावट आहे. समाजात जातिवाद अजूनही किती खोलवर रुजला आहे, हे या घटनेतून दिसून आले. सक्षमच्या मृत्यूनंतर अनेक संघटना आणि विद्यार्थी वर्गाने आंदोलन केले. सक्षमच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी रस्त्यावरून होत आहे. राजकीय नेत्यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांना पारदर्शक तपास करण्याचे आवाहन केले आहे. जातीय अंधश्रद्धा आणि सामाजिक दबाव राज्य सरकारनेही या प्रकरणाला गंभीरतेने घेतले आहे. हत्या प्रकरणाच्या तपासात कोणतीही ढिलाई होणार नाही आणि दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, असा विश्वास पोलिसांनी दिला आहे. दुसरीकडे सक्षमच्या मृत्यूने जनमानसात असलेली अस्वस्थता, जातीय अंधश्रद्धा आणि सामाजिक दबाव या प्रश्नांना पुन्हा एकदा उघडे पाडले आहे. प्रेमाला समर्थन देण्याऐवजी प्रेमिकांना शिक्षा मिळण्याची ही भीषण मानसिकता बदलण्यासाठी आता समाजाने पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सक्षमच्या प्रकरणाने केवळ नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रात मोठा सामाजिक संवाद सुरू केला आहे.
जामखेडच्या खर्डा रोडवरील एका लॉजमध्ये नृत्य सादर करणारी कलाकार दिपाली पाटील हिने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तपासात प्राथमिकदृष्ट्या उघडकीस आलेल्या माहितीनुसार, दिपालीवर लग्नासाठी मानसिक दबाव टाकण्यात येत होता. हे दबाव आणणारे व्यक्ती म्हणजे भाजपचे माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे संदीप गायकवाड यांचा स्वतःचा विवाह झाला असूनही, ते दिपालीशी लग्न करण्याचा तगादा लावत होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या छळामुळे मानसिक त्रासाला कंटाळून दिपालीने अतिउग्र पाऊल उचलल्याची चर्चा आहे. घटनेनंतर जामखेड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. आता पोलिस चौकशीतून आणखी कोणती माहिती बाहेर येते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणानंतर जामखेडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी संदीप गायकवाड हे स्वतः भाजपचे माजी नगरसेवक असून, त्यांच्या पत्नी लता गायकवाड या नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या उमेदवार आहेत. या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला घोषित होणार आहे. मात्र, त्याआधीच या प्रकरणाने उचललेला वाद भाजपसाठी डोकेदुखी ठरताना दिसतो आहे. सध्या संपूर्ण शहरात या घटनेची चर्चा असून, राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम दिसत आहे. या घटनेवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ज्याच्या पत्नीला भाजपने नगरसेवक पदाची उमेदवारी दिली, तोच व्यक्ती एका नर्तकीवर लग्नाचा दबाव आणतो आणि तिचा जीव जातो. हा भाजपचा खरा चेहरा. त्यांनी पुढे सांगितले की, दिपालीला न्याय मिळावा म्हणून आम्ही तपासावर बारकाईने लक्ष ठेवू. कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी सत्य बाहेर आणावे. रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे प्रकरणाला राजकीय स्वरूप मिळाले असून, भाजपची अडचण आणखी वाढली आहे. बाजारात जाते, असे सांगून घराबाहेर पडली दिपाली पाटील ही मूळची कल्याण येथील रहिवासी होती. ती जामखेडमधील तपनेश्वर परिसरात मैत्रिणींसोबत राहत होती. घटना घडण्याच्या दिवशी ती सकाळी बाजारात जाते, असे सांगून घराबाहेर पडली. संध्याकाळपर्यंत ती परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. रिक्षाचालकाने दिपालीला साई लॉजवर सोडल्याची माहिती दिल्यावर त्या थेट लॉजवर पोहोचल्या. खोली आतून लॉक होती. कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता, पंख्याला गळफास घेतलेली दिपाली मृतावस्थेत आढळली. लगेच पोलिसांना सूचना देत मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. तिच्या मृत्यूनंतर तिच्या मैत्रिणींनी सांगितलेल्या माहितीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. महिलांच्या सुरक्षिततेसंबंधी अनेक प्रश्नचिन्हे या प्रकरणाने महिलांच्या सुरक्षिततेसंबंधी अनेक प्रश्नचिन्हे निर्माण केली असून, आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. समाजातील अशा घटनांना आळा बसण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...
एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेतील (धनकवडी) नवीन सभासदांना शेअर सर्टिफिकेट देण्यासाठी आणि भविष्यातील लिलावात विशिष्ट व्यक्तीला मालमत्ता मिळवून देण्यासाठी तब्बल 8 कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या लिक्विडेटर व माजी प्रशासकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. तडजोडीअंती 30 लाख रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी विनोद माणिकराव देशमुख (वय 50, सध्याचे लिक्विडेटर) आणि भास्कर राजाराम पोळ (वय 56, माजी प्रशासक आणि सरकारी पॅनेल ऑडिटर) या दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2005 मध्ये 61 वर्षीय तक्रारदारासह 33 जणांनी जुन्या सभासदांकडून शेअर्स खरेदी करून या सोसायटीचे सभासदत्व घेतले होते. 2020 मध्ये सभासदत्वावरून वाद निर्माण झाल्याने सहकार विभागाने सोसायटीवर प्रशासक नेमला. त्यानंतर 2024 मध्ये सोसायटी लिक्विडेशनमध्ये काढण्यात आली आणि विनोद देशमुख यांची लिक्विडेटर म्हणून नियुक्ती झाली. तक्रारदार व इतर 32 सभासदांनी 2023 मध्ये तत्कालीन प्रशासक भास्कर पोळ यांच्याकडे शेअर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता. पोळ यांनी इतर 32 जणांचे अर्ज निकाली काढले, मात्र तक्रारदार सुनावणीस हजर नसल्याने त्यांचा अर्ज प्रलंबित ठेवला. सप्टेंबर 2025 मध्ये तक्रारदार पोळ यांच्याकडे चौकशीस गेले असता, पोळ यांनी स्वतःसाठी व सध्याचे लिक्विडेटर देशमुख यांच्यासाठी 3 कोटी, तर भावी लिलावात तक्रारदार सांगतील त्या व्यक्तीला मालमत्ता देण्यासाठी 5 कोटी अशी एकूण 8 कोटी रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदारांनी 5 डिसेंबर 2025 रोजी पुणे एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने प्रथम लाचेची पडताळणी केली असता, 8 कोटींची मागणी खरी असल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती 30 लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून देण्याचे ठरले. एसीबीने शनिवार पेठेतील तक्रारदारांच्या कार्यालयासमोर सापळा रचला. देशमुख यांनी पंचांसमोर 30 लाखांची रोख रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली. एसीबी अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पुणे विभागातील सहकारी संस्थांच्या लिक्विडेशन प्रक्रियेत एवढ्या प्रचंड रकमेची लाच मागितल्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे.
बहरिनमध्ये जय पवार यांचा शाही विवाहसोहळा गाजला:PHOTO आणि VIDEO व्हायरल; अजित पवारांचा झिंगाट डान्स
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा शाही विवाह सोहळा बहरीन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पवार आणि पाटील कुटुंबीयांनी बहरीनमध्ये चार दिवसांचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत विविध पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा रंगतदार माहोल तयार करण्यात आला होता. जय पवार आणि साताऱ्यातील फलटणचे सुप्रसिद्ध उद्योगपती तसेच सोशल मीडिया कंपनी चालवणारे प्रविण पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील विवाहबंधनात अडकले आहेत. 5 डिसेंबर रोजी दोघांचा विधीवत लग्नसोहळा साक्षीदारांच्या उपस्थितीत झाला. या खास विवाहसोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झळकू लागले असून चाहत्यांमध्ये या लग्नाची चर्चा रंगत आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावर काही खास क्षण शेअर केल्यानंतर हा लग्नसोहळा अधिक चर्चेत आला. वरातीदरम्यान सैराट चित्रपटातील लोकप्रिय झिंगाट गाण्यावर अजित पवार आणि रोहित पवार यांनी केलेला डान्स सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. त्यांच्या या बेधुंद नृत्याचे व्हिडीओ सध्या मोठ्या वेगाने व्हायरल होत आहेत. कुटुंबीयांची आनंदी मुद्रा आणि संपूर्ण वातावरणातील जल्लोष यामुळे या सोहळ्याची रंगत आणखी वाढली. लग्नपत्रिकेनुसार कार्यक्रमांची शृंखला 4 डिसेंबरपासूनच सुरू झाली होती. पहिल्या दिवशी मेहेंदीचा कार्यक्रम रंगला तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 डिसेंबरला हळदी, वरात आणि मुख्य लग्न समारंभ पार पडला. त्यानंतर 6 डिसेंबर रोजी संगीताचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शेवटचा दिवस म्हणजे 7 डिसेंबरला नवरदेव-नवरीसाठी खास स्वागत समारंभ ठेवण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमांसाठी मागील काही दिवसांपासून पवार कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू होती. सोशल मीडियावरूनही दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव बहरिनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि जल्लोषात पार पडलेला पवार-पाटील कुटुंबाचा हा विवाह सोहळा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रातील राजकीय घराणे, मान्यवर आणि नातेवाईकांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अधिक शोभून दिसला. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या नव्या आयुष्याला शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पवार कुटुंबाचा हा आनंदाचा क्षण अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावरूनही दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून या नवदाम्पत्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातून मंगलकामना व्यक्त केल्या जात आहेत.
संत ही व्याख्या वेगळी आहे. संत नैराश्य दूर करून माणसात चेतना निर्माण करतात. म्हणूनच संतांचा अवतार समाजाला आरसा दाखविण्यासाठीच झाला आहे. असे प्रतिपादन जगद्गुरू पलसिद्ध महा स्वामी पिठाचे मठाधिपती सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केले. आज ५ डिसेंबर रोजी साखरखेर्डा येथे संतश्रेष्ठ सावता माळी यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संत सावता माळी यांचे अठरावे वंशज रविकांत वसेकर अरणगांव, प्रकाश महाराज मगर, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी प्राचार्य संतोष दसरे, बाजार समिती संचालक दिलीपराव बेंडमाळी, ग्रामपंचायत सदस्य संदीप खिल्लारे, डॉ. प्रशांत भालेराव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत सावता माळी यांचे अठरावे वंशज हभप रविकांत वसेकर महाराज व सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते संत सावता माळी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन सोहळा पार पडला. यावेळी वसेकर महाराज यांनी मंदिर बांधणे सोपे असून पावित्र्य राखणे महत्त्वाचे असल्याचे सांगून संत सावता माळी यांचे विचार प्रकट केले. यावेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी आपले विचार व्यक्त करीत संस्थानला अकरा हजार रुपयांची देणगी दिली. यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अध्यात्माचा मळा पुढे आपल्या आशीर्वचन सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज म्हणाले की, संत ही वृत्ती प्रवृत्ती आहे. साधना करताना सदवृत्तीशी स्पर्श झाला, त्याला संत म्हणतात. संतांचा अवतार समाजाला आरसा दाखवण्यासाठी झाला आहे. परमेश्वराचे आपण वंशज आहोत. परंतु आपण संसारात गुंतल्याने विभक्त झालो. विश्वाचे अरण्य झाले असताना संत सावता माळी यांनी अध्यात्माचा मळा फुलविला. आपल्या कर्मात आणि कष्टात त्यांनी परमेश्वर पाहिला आहे. संत संसारात जरी होते तरी तनाने परमार्थात होते,असे ते म्हणाले.
समाजकल्याण अधिपत्याखाली चालणाऱ्या मागासवर्गीय मुलांचे विद्यार्थी शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात येत असल्याचा आरोप सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केला आहे. बाबत समाजकल्याण अधिकाऱ्यांना संघटनेतर्फे निवेदन सादर करण्यात आले. यावर तातडीने योग्य व ठोस कार्यवाही न झाल्यास संघटना विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढील तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असा इशाराही देण्यात आला. संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. अन्नाची स्वच्छता, गुणवत्तापर नियंत्रण, चव, पौष्टिकता याचा कोणताही शासकीय दर्जा पाळला जात नाही. या स्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यावर, मानसिक स्थितीवर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. निवेदन देताना सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष इंजि. धिरज इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष स्वरूप इंगोले, प्रसिद्धि प्रमुख अंकित इंगळे, सोशल मीडिया प्रमुख अंकुश धुरंधर, सचिव राहुल खाडे, मंगेश बलखंडे, सोमेश दाभाडे, प्रकाश पाटील आदी विद्यार्थी उपस्थित होते. या केल्या मागण्या १)भोजन वसतिगृहातील व्यवस्थेची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. २) निकृष्ट अन्न पुरवठा करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर त्वरित दंडात्मक व शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी. ३) नवीन भोजन पुरवठा व्यवस्था शासकीय कार्यपद्धतीनुसार पारदर्शकतेने सुरू करावी आणि गुणवत्ता तपासणी समिती तत्काळ स्थापन करावी. ४) विद्यार्थ्यांच्या तक्रारींची नोंद व निवारणासाठी विशेष लेखी नोंदवही व यंत्रणा उपलब्ध करून द्यावी. ५) विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणाला शून्य सहनशीलता धोरणाने हाताळावे.
येथील श्री धनैश्वरी मानव विकास मंडळ संचालित डॉ. वंदनाताई जगन्नाथराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयात नव्याने वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशित बीएएमएसच्या विद्यार्थ्यांना आयुर-पर्यवेक्षिका उपक्रमातून आयुर्वेदाबाबत माहिती देण्यात आली. यात आयुर्वेदाचा इतिहास, महाविद्यालयाचे वैशिष्ट्ये, शैक्षणिक सुविधा, हॉस्पिटलची रचना, रुग्णसेवेची पद्धत, आयुर्वेदातील भविष्यातील संधीबाबत माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक डॉ. साजिद शेख होते. डॉ. साजिद शेख यावेळी म्हणाले की, तुम्ही डॉक्टर होण्याच्या प्रवासाची पहिली पायरी चढत आहात. आयुर्वेद केवळ उपचारपद्धती नसून, ते एक जीवनदर्शन आहे. प्रमुख पाहुणे मोझरी येथील गुरुदेव सेवा मंडळ आयुर्वेद कॉलेजचे डॉ. पोदाळे यांनी सांगितले की, आयुर्वेदशास्त्र जगभर झपाट्याने विस्तारत आहे. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे हे शिक्षण घेतले तर समाजाला आरोग्याच्या दिशेने नवे योगदान देता येईल. जनसंपर्क अधिकारी धनंजय मिश्रा यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे अधीक्षक संतोष सोमानी, शरद अवचार, रमेश पोहरे, फारुख भाई, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्राचार्या, उपप्राचार्यांचे मार्गदर्शन : महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री काटोले यांनी महाविद्यालयातील विभागांची माहिती, प्रयोगशाळा सुविधा, पंचकर्म केंद्र, शैक्षणिक कार्यशैलीवर प्रकाश टाकला. उपप्राचार्य डॉ. अभय भुस्कळे यांनी विद्यार्थ्यांनी अनुसरण्याची शिस्त, उपस्थिती धोरण, रुग्णालयातील प्रत्यक्ष प्रशिक्षण, आयुर्वेदातील संशोधनाची शक्यतेबद्दल मार्गदर्शन केले. महाविद्यालय व रुग्णालयाचा प्रत्यक्ष अनुभव, नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना पंचकर्म विभाग (रसायन), प्रायोगिक विभाग द्रव्यगुण प्रयोगशाळा, आयुर्वेदिक रुग्णालयातील विविध ओपीडी व आयपीडी औषधनिर्मिती प्रक्रिया, हर्बल गार्डनची प्रत्यक्ष ओळख करुन देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आयुर्वेदिक उपचारपद्धती, निदानशास्त्र व रुग्णसेवेतील भारतीय मूल्यांचा अभ्यास केला.
भारतात १८५७ पासून स्वातंत्र्य लढ्याला प्रारंभ झाला. या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजानेही मोठे योगदान दिले आहे. भारताला ब्रिटिशापासून मुक्त करण्यासाठी आदिवासी समाजाच्या अनेक महापुरुषांनी बलिदान देऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केले. मात्र इतिहासकारांनी आदिवासी समाजाच्या अभूतपूर्व लढ्याची दखल घेतली नसल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त उपायुक्त व आदिवासी साहित्य व समस्यांचे अभ्यासक नागपूर येथील प्रभू राजगडकर यांनी केले. ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभेच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजि व्याखानमालेत प्रभू राजगडकर यांनी ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आदिवासी या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, या देशात सातशेच्यावर आदिवासी जमाती असून, त्यांची लोकसंख्या दहा कोटींपेक्षा जास्त आहे. ब्रिटिशावर सर्वात प्रथम उठाव आदिवासी समाजाने केला. आंध्रप्रदेशात १८५७ मध्ये उठाव करण्यात आला. तसाच राजस्थानमध्येही भिल्लांनी उठाव केला. विदर्भातील चंद्रपूरमध्ये आदिवासींनी उठाव केला असल्याची नोंद आहे. त्याचप्रमाणे झारखंडमध्ये बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशाविरुद्ध उठाव केला. आदिवासी समाजात गौंड, मुंडा, संथाल, भिल, तंट्या भिल, कोलार आदी आदिवासींच्या जमाती अस्तित्वात आहेत. देशात राजस्थान, आंध्रप्रदेश आदी ठिकाणी ही आदिवासींनी उठाव केला आहे, असे ते प्रभू राजगडकर म्हणाले. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने या व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. अनिल भगत यांनी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी राजगडकर, श्रीधर अंभोरे व रामटेके यांचे स्वागत करण्यात आले. वक्ता परिचय समाधान जावळे यांनी केला. ६ डिसेंबर रोजी नागपूर येथील राष्ट्रीय प्रबोधनकार अरविंद माळी हे ‘मानवीय स्वातंत्र्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला संघर्ष’, या विषयावर व्याख्यान सादर करणार आहेत. या कार्यक्रमात रोज सायंकाळी ५.३० वाजता भीम गीतांचा कार्यक्रम ही होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित या व्याख्यानाचा सर्व नागरिक महिला पुरुषांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. असेही षडयंत्र आदिवासी समाज हा दोन पातळ्यांवर लढला आहे. त्यामधील प्रथम पातळी ही ब्रिटिशांविरुद्धची होती, तर दुसरी संरजामशाहीविरुद्ध होती. जंगल, जमीन प्राणी आदींशी संबंधित असणाऱ्या या समुदायाच्या अधिकार व हक्कांवर गदा आणण्यात आली. आदिवासी समाजाची अस्मिता व स्वावलंबन नष्ट करून त्यांना वनवासी करण्याचे षडयंत्र पद्धतशीरपणे आखल्या जात असल्याचेही ते प्रभू राजगडकर म्हणाले.
‘आला हिवाळा, प्रकृती सांभाळा..' या म्हणीप्रमाणे अकोलेकर आरोग्याप्रती सध्या अधिक सजग झाल्याचे चित्र आहे. थंडीची चाहूल लागताच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त अशा पौष्टिक डिंक लाडूसाठी सुकामेवा खरेदीला वेग आला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने सुकामेव्यावरील जीएसटी ५ टक्क्यांवर आणल्याने काजू , बदाम, खारीक, अक्रोड आणि पिस्ता यांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत किलोमागे ५० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा मिळाला असून, बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. थंडीची चाहूल लागताच गृहिणींची लगबग सुरू होते ती डिंकाचे लाडू करण्यासाठी. हिवाळ्यात उत्तम प्रकृतीसाठी हिरव्या पालेभाज्यांसह आरोग्यवर्धक इतरही पोषक पदार्थ खाण्याकडे कल असतो. त्यामुळे एरव्ही उन्हाळ्याच वर्ज्य असलेल्या गरम पडणाऱ्या व शरीरास ऊब देणाऱ्या वस्तू हिवाळ्यात आवर्जून सेवन केल्या जातात. मागील काही दिवसांमध्ये पारा जलद गतीने खाली चालला आहे. त्यामुळे थंडीपासून शरीराचे संरक्षण व्हावे आणि उब मिळावी यासाठी डिंकाचे लाडू तयार करतात. बदाम ८०० ९६० काजू ८४० ९२० अंजीर ११०० १६०० खोबरे ३५० ४०० खारीक ३५० ६०० अक्रोड ८०० ९५० अक्रोड बी १२०० १६०० पिस्ता १८०० २००० गोळंबी १४०० १६०० डिंक ४०० २००० सध्या बाजारात डिंक, मेथी व सुकामेव्याचा लाडूच्या साहित्याचा बाजार गरम आहे. दुसरीकडे, गृहिणींची स्वयंपाकघरात पौष्टीक डिंक लाडू बनवण्याची लगबग सुरू आहे. थंडीत हाडे मजबूत राहावीत आणि दिवसभर ऊर्जा मिळावी, यासाठी सुकामेव्याचे डिंक लाडू बनवण्यावर भर दिला जात आहे. यासाठी लागणारे बदाम, काजू, अंजीर, खोबरे, गोळंबी, अक्रोड, पिस्ता आणि खारीक या साहित्याला किराणा बाजारात मोठी मागणी वाढली आहे. काजू, बदाम, खारीकचे दर आले आवाक्यात ^दरवर्षी हिवाळ्यात सुकामेव्याला मागणी असते. पण यंदा केंद्र सरकारने जीएसटी ५ टक्क्यांवर आणल्याने दर कमी झाले आहेत. काजू, बदाम, खारीक आणि अक्रोडचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. त्यामुळे यंदा ग्राहकांचा खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. - कमलसेठ जैन, सुकामेवा व्यापारी, अकोला.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चिंचोना यांनी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तब्बल २० गुंठे क्षेत्रावर परसबाग, औषधी वनस्पती बाग, फळबाग आणि फुलबाग निर्मिती केली आहे. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून ही बाग फुलत आहे. त्याचा उपयोग दैनंदिन शालेय पोषण आहारासाठी केला जात आहे. तसेच गावातही या भाजीपाल्याची विक्री होत आहे. त्यामुळे शाळेला यातून उत्पन्न ही मिळत आहे. हे शाळेच्या विकासासाठी वापरण्यात येत आहे. शाळेतील परसबागेत मेथी, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, मिरची, भेंडी, गाजर, मुळा, काकडी, शेवगा, पत्तागोबी, अंबाडी यांसह विविध भाज्यांचा सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतले जाते. या ताज्या भाज्यांचा थेट खिचडी व इतर पोषण आहारात उपयोग केला जात आहे. उरलेला भाजीपाला गावात विक्री करून शाळेला आर्थिक लाभही मिळत आहे. तसेच औषधी वनस्पतीही बागेत लावण्यात आली आहे. यामध्ये तुळस, अलोविरा, गवती चहा, काळी हळद, मधुकामिनी, नागकेशर, लवंग, कापूर यांसह अनेक औषधी वनस्पतींची जोपासना करण्यात आली आहे. तसेच फळबागेत आंबा, पेरू, संत्रा, केळी, आवळा, चिकू, सिताफळ, स्टार फ्रूट यांसारख्या विविध फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. फुलबागेत जास्वंद, झेंडू, मोगरा, गुलाब, लिली आदी फुलझाडे शोभा वाढवत आहेत. सर्व बागांमध्ये केवळ सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून नांगरणी, पाणी देणे, तणनियंत्रण, खत व्यवस्थापन अशा सर्व कामांची शिस्तबद्धपणे अंमलबजावणी केली जाते. यासाठी मुख्याध्यापक सुभाष वानखडे, अनिल मोहड, राजेश सोमवंशी, अमोल वाघमारे, लिना कारंजकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना आरोग्यासाठी उपयुक्त शाळेतील मुलांना रासायनिक व केमिकल विरहित अन्न उपलब्ध व्हावे. या उद्देशाने शाळेत परसबाग विकसित करण्यात आली. या परस बागेतून मिळणारा भाजीपाला व फळांचा लाभ केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर गावातील नागरिकांना मिळत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना शुद्ध, रासायनिक मुक्त व आरोग्यदायी भाजीपाला उपलब्ध होत आहे. यातून आरोग्यवर्धक अन्नाची सवय लागण्यासही मदत होत आहे. सुभाष वानखडे, मुख्याध्यापक, जि. प. शाळा चिंचोना
छोगालाल राठी गुरुकुल विद्यालय, ज्ञानेश्वर पवार कनिष्ठ महाविद्यालय व एच.एस.सी. व्होकेशनल भातकुली यांच्या २०११-१२ सालच्या बॅचचा माजी विद्यार्थी महामेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल १३ वर्षांनंतर जुने मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने परिसरात आनंदाचे व भावनिक वातावरण पसरले. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी पुन्हा एकत्र जोडले गेले व जुन्या आठवणींचा धागा पुन्हा विणला गेला. विशेष म्हणजे हा महामेळावा ज्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले, त्याच प्रांगणात आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. यानंतर छोगालाल राठी गुरुकुल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना चेचरे, प्राध्यापक निलेश गाडबैल, रवींद्र राठोड, योगेश उमक, किरण मंत्री, ठाकूर, परतेकी यांनी माजी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मेळाव्याच्या स्मरणार्थ वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत राठी, उद्घाटक नंदकिशोर बजाज, प्रमुख पाहुणे बद्रीनाथ भोपसे, श्यामसुंदर लाठी, नितीन मालपाणी आदी मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन केले. मुख्याध्यापिका अर्चना चेचरे, माजी मुख्याध्यापक गजानन लेंडे, सुभाष चतुर्भुज, संजय भोमे यांनी मनोगते व्यक्त केली. माजी शिक्षक व पाहुण्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये गुजरात, मुंबई, पुणे, अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यातील सुमारे १५० ते २०० विद्यार्थी सहभागी झाले. अनेकांनी आपल्या मुलांना सोबत आणून त्यांना आपल्या शाळेची ओळख करून दिली. तसेच माजी विद्यार्थिनींनी खेळ, खो-खो, संगीत खुर्ची आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. सर्वांनी आपला परिचय देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. भोजनानंतर कार्यक्रमाचा शेवट गोड करण्यात आला आणि पुन्हा भेटण्याची इच्छा सर्वांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी दाखवलेला आदर व प्रेम पाहून शिक्षक भावूक झाले. विद्यार्थी-शिक्षक नाते हे आयुष्यभर टिकणारे आहे, असे शिक्षकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. भविष्यात सर्व बॅचचा एकत्रित मेळावा आयोजित करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांनी सांगितले की हा मेळावा महत्वाचा ठरला. या पुढेही वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शाळेसाठी आवश्यक मदत करण्याचा निर्धार आम्ही सर्व माजी विद्यार्थी केला. विद्यार्थी मेळाव्यात शिक्षकांचा भावनिक क्षण: डोळे पाणावले
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून गुरुवारी नांदगाव पेठ ग्रामपंचायतच्या वतीने लोकसहभाग आणि श्रमदानाच्या बळावर वनराई बंधारा बांधण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. गटविकास अधिकारी तूपे आणि विस्तार अधिकारी सीडाम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदवत लोकसहभागाचा आदर्श उभा केला. वनराई बंधाऱ्याच्या बांधकामामुळे गावातील जलसंधारण क्षमतेत वाढ होऊन शेतीसाठी आवश्यक पाण्याचा स्थिर स्रोत निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातील युवक, महिला मंडळे तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या एकजुटीने श्रमदान करून सरकारी योजना व लोकसहभाग यांची उत्कृष्ट सांगड घातली. गटविकास अधिकारी तूपे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, पाण्यासारख्या अत्यावश्यक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग हीच खरी ताकद आहे. नांदगाव पेठने पुन्हा एकदा सामूहिक शक्तीची जाणीव करून दिली आहे. या वेळी सरपंच कविता डांगे, उपसरपंच मझहर खा सफदर खा, ग्रामपंचायत अधिकारी हर्षदा बोंडे, शिवराजसिंह राठोड, छत्रपती पटके, मंदा कापडे, विभा देशमुख, जगदीश इंगोले, किशोर नागापुरे, श्रीधर राऊत, बलविर चव्हाण, मो.शाकिर परवेज मो साबीर, सलमा सुलताना हमीदशाह, आशा चंदेल, वृषाली इंगळे, उर्मिला गायगोले, वंदना भटकर ग्रामपंचायत कर्मचारी राहुल बोडखे आदींची उपस्थिती होती. विस्तार अधिकारी सिडाम यांनीही ग्रामस्थांचे प्रोत्साहन करत सांगितले की, अभियानाच्या उद्दिष्टांनुसार गावच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. नांदगाव पेठने त्यात पुढाकार घेतल्याने गाव विकासाचा आदर्श निर्माण झाला आहे. या श्रमदानातून बांधलेल्या बंधाऱ्यामुळे पाणीसाठा वाढण्याबरोबरच जैवविविधतेलाही हातभार लागणार आहे. ग्रामविकासाचा पाया मजबूत होईल. अभियानाच्या उद्दिष्टांनुसार गावच्या विकासासाठी उपक्रम
शतकानुशतके भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या बांबू वस्तूंचा वापर आज वेगाने कमी होत चालला आहे. पूर्वी घराघरात बांबूपासून तयार होणाऱ्या चाळण्या, टोपल्या, सूप, चटया, मोर्या, झाडू, कुरड्या अशा वस्तूंशिवाय संसार अपूर्ण वाटायचा. पण, आता प्लास्टीकच्या स्वस्त आणि झटपट उपलब्ध वस्तूंनी आक्रमण केल्याने पारंपरिक व्यवसायाला ग्रहण लागले आहे. बुरूड समाजातील कारागिर आपल्या कलेचा वारसा जपत पिढ्यानपिढ्या या व्यवसायावर अवलंबून राहिले आहे. बांबूची कलाकुसर, त्यातील टिकाऊ रचना आणि नैसर्गिकता हे या वस्तूंचे वैशिष्ट्य होते. मात्र, आधुनिक युगातील प्लास्टीकच्या स्वस्त आणि आकर्षक वस्तूंनी ग्राहकांचा कल त्या दिशेने वळवला.परिणामी बांबू वस्तूंना बाजारात मागणी उरलेली नाही. बुरूड समाजातील कुटुंबांना आज रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तरुण पिढी या व्यवसायातून बाहेर पडून इतर कामांकडे वळत आहे. पारंपरिक कलेचा वारसा हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पर्यावरणपूरक आणि पुन्हा वापरता येणारा स्रोत आहे. सरकारने तसेच स्थानिक स्वराज संस्थांनी बांबू वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन दिल्यास एकीकडे पर्यावरणाचे रक्षण होईल, तर दुसरीकडे पारंपरिक कारागिरांनाही रोजगाराचा आधार मिळू शकेल, अशी मागणी बुरूड समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीचा पर्यावरणाशी संबंध भारतीय संस्कृतीचा पर्यावरणाशी जवळचा संबंध आहेत. त्यामुळे आपले सर्व सण, उत्सव हे निसर्ग व पर्यावरणाशी निगडीत आहेत. या सण उत्सवाला बांबूपासून निर्मित विविध वस्तुंची आवश्यकता असते. टोपली, केरसुनी, झाडू, परडी, सूपाची विवाह समारंभांमध्येही आवश्यकता असते. त्याशिवाय ते पूर्ण होत नाहीत. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत बांबूपासून निर्मित वस्तुंची मनुष्याला आवश्यकता भासत आली आहे. अशात पर्यावरणासाठी घातक तसेच स्वस्त असले तरी नुकसानदायक प्लास्टिक वापरावर बंदी घालणे आवश्यक आहे. तेव्हाच बांबूपासून निर्मित वस्तुंना पुन्हा चांगली बाजारपेठ आणि बुरूड समाजाला चांगला रोजगार मिळेल.
अमरावती शालेय वयातच विद्यार्थ्यांनी कल्पना शक्ती पलिकडे तयार केलेल्या विविध विषयांवरील संशोधन मॉडेल्स पाहून विद्यार्थ्यांच्या कल्पनांना पंख फुटले, असा एकंदरीत सूर प्रदर्शनीमधील मॉडेल्स पाहून निघाला. त्यामुळे शालेय विद्यार्थी भविष्यात निश्चितच उंच भरारी घेतील, हे निश्चित. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ज्युनियर हॅकेथॉन- २०२५ चे आयोजन करण्यात आले. इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेला भरभरुन प्रतिसाद देत आपापल्या कल्पनांनी तयार केलेली विविध विषयांवरील संशोधन मॉडेल्स यावेळी सादर करण्यात आलीत. प्रदर्शनीचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या हस्ते झाले. या वेळी मनपा आयुक्त डॉ. सौम्या शर्मा, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेली संशोधन मॉडेल्स पाहून संवाद साधला. तसेच त्यांच्या मॉडेल्सची माहिती जाणून घेतली. संशोधन मॉडेल्स कशी आणि किती फायदेशीर आहेत, त्यांच्या मॉडेल्सचे उपयोग यावेळी मान्यवरांना सांगितले. टेक्नॉलॉजी अॅन्ड डिजिटल इन्नोव्हेशन, एन्व्हार्यमेंट अॅन्ड सस्टेनबिलिटी, हेल्थ अॅन्ड बेलबिइंग, ओपन थिम असे विषय ठेवण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली विविध विषयांवरील मॉडेल्स सादर केली. या वेळी इन्क्युबेशन सेंटरच्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद यादव, इन्क्युबेशन सेंटरचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध विषयावरील संशोधन प्रदर्शनाचे पाहणी करताना मान्यवर. कार्यक्रमारम्यान शहराच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्वाची चर्चा झाली. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी अमरावतीत आय.टी. पार्क काळाची गरज आहे, असे सांगून शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना प्रगल्भ बनवणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात ते आपले उज्ज्वल जीवन घडवू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी सुद्धा आय.टी. पार्कसाठी शासनाकडे सुद्धा याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आहे.
तालुक्यातील आदर्श गाव ग्रामपंचायत सांगवा बू. येथे संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत सांगवा येथील सांगवा-उपराई पांदन रस्ता ग्रामपंचायत प्रशासन, लोकसहभाग व श्रमदानातून दुरुस्त करण्यात आला आहे. या उपक्रमास गावातील नागरिक अनिल सगणे, आकाश कराळे यांनी माती आणण्यासाठी ट्रॅक्टर व डिझेल सेवा उपलब्ध करून दिली. तसेच गावातील शेकडो नागरिक, महिला यामध्ये सहभागी होऊन सक्रिय सहभाग दिला. यामध्ये एकूण ५०० मीटर लांबीचा पांदण रस्ता दुरुस्तीकरिता श्रमदान करीत पूर्ण करण्यात आले. यामुळे थेट शेतात बंडी, ट्रॅक्टर थेट शेतापर्यंत घेऊन जाणे नागरिकांना सोयीचे झाले आहे. सांगावा बू. गावात भेट दिली. या वेळी गावची पाहणी करुन विकासकामांचा आढावा घेतला. तसेच मुख्यमंत्री पंचायत राज अभियानमध्ये भरीव कामगिरी करुन विभागस्तरापर्यंत पोहचण्यासाठी प्रेरणा दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही योग्य नियोजन केले. या श्रमदानामध्ये गावचे सरपंच राजू कराळे, उपसरपंच विजय सगणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी सुरज भोपसे, रोजगार सेवक उमेश दहे, ग्रामपंचायत कर्मचारी उमेश गोरे, अंगणवाडी सेविका, गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. आर.आर.आबा सुंदर गाव स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. आता मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध राज अभियान पुरस्कार मिळवण्यासाठी शासन निर्णयानुसार दैनंदिन अनेक स्तुत्य उपक्रम लोकसहभागातून व श्रमदानातून राबवल्या जात आहेत. गावातील ग्रामस्थांनी स्वईच्छेने लोकवर्गणी केली आहे. त्यातून अनेक लोकापयोगी सुविधा निर्माण करण्याचा प्रामाणिक हेतू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही अनेक समाजोपयोगी उपकम राबवणार आहोत. - राजू कराळे, सरपंच सांगवा बुद्रुक
मतदानाच्या ईव्हीएमच्या स्ट्राँगरूमचे एलईडी स्क्रिनवर थेट प्रक्षेपण करावे, सोबतच राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना सदर ठिकाणी पाहणी करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात स्थानिक निवडणूक अधिकारी व निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुका पार पडल्या असून ३ डिसेंबर रोजी सदर निवडणुकीचा निकाल घोषित करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक होते. मात्र, राज्यातील काही नगर परिषदेच्या महिला आरक्षणामध्ये घोळ झाल्याने नागपूर खंडपीठाने सदर निवडणुका स्थगित केल्या. राज्यातील ज्या ठिकाणी निवडणूक झाली येथील निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही ठिकाणी ईव्हीएमवर शंका व्यक्त केली जात आहे. २० दिवस स्ट्राँगरूमच्या सुरक्षेतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळेच स्ट्राँग रूमच्या देखरेखीचे थेट प्रक्षेपण एलईडी स्क्रीनवर करण्यात यावे. उमेदवार किंवा राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना पाहणी करण्याची परवानगी देण्यात यावी. सदर ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेना राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी निवडणूक आयोग व स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे. या वेळी प्रकाश मारोटकर, अमोल शिरभाते, निलेश इखार, प्राप्ती मारोटकर, अनिता भंडारे, कांता लोमटे, जयश्री सुहागपुरे, वनिता काळपांडे, वासुदेव लोखंडे, शेख जमीर, शेख राहील, रवी ठाकूर, प्रकाश ब्राम्हणवाडे, शेख शारुख, शेख सलमान, लोमटे, शुभम रावेकर, अक्षय मुके उपस्थित होते. नांदगाव खंडेश्वर | नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची निवडणूक आयोगाने निकालाची तारीख वाढवून २१ डिसेंबर केली. उमेदवार व मतदारांच्या मनात सध्या परिस्थिती बघता संभ्रम निर्माण झालेला आहे. ते बघता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवार ५ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटल्याप्रमाणे मतदान यंत्र ज्या स्ट्राँगरूममध्ये ठेवले आहे. त्याच्या १०० मीटर परिसरात नेटवर्क जामर लावा, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे मतदान यंत्र हॅक करता येणार नाही. यावेळी तालुका सचिव श्याम शिंदे, शहर सचिव अब्दुल मोहसीन, आसमा परविन अब्दुल मोहसीन, शशिकला घोडाम, रितेश कटाने, प्रांजली शिंदे, अब्दुल राजीक, शहेनशहा, किशोर शिंदे, राजगुरू शिंदे, शैलेश कटाने उपस्थित होते.
दोन डिसेंबरला दर्यापूर नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. सर्व नगराध्यक्ष व नगरसेवकपदांच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्र सुरक्षित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करत पालिकेत पहिल्या माळ्यावर सुरक्षित ठिकाणी व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने ठोस उपाय योजना म्हणून स्ट्रॉग रुमच्या सर्वच बाजूंनी एसआरपीएफ जवान व दर्यापूर ठाण्याचे दोन अधीकारी व दहा पोलिसांचा खडा पहारा चोविस तास लागलेला आहे. स्ट्राँगरूमच्या आत आणि बाहेरील परिसरात सीसीटीव्हीची निगराणी आहे. यावेळी पालिका परिसरात अज्ञात व्यक्तींना प्रवेश नाकारला आहे. प्रवेशद्वारावर सुद्धा सुरक्षा यंत्र बसवण्यात आले आहे. एकंदरीतच सशस्त्र पोलिसांचा फौज फाटा ईव्हीएम मशीनच्या सुरक्षा दृष्टिकोनातून तैनात करण्यात आलेला आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खंडारे यांनी दिली.
भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू येथे कृषी विभाग व कृषी व्यवस्थापन यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली चिया बियाण्याच्या लागवडीचा पहिलाच प्रयोग राबविण्यात आला आहे. कमी पाणी लागणारे, पौष्टिक आणि बाजारात चांगली मागणी असलेले हे पीक हरभऱ्याला पर्यायी ठरणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. या प्रात्यक्षिकासाठी चिया बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले असून जिजामाता कृषी भूषण पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी पोर्णिमा विजयराव सवाई यांनी स्वतः शेतात उतरून पेरणीची सुरुवात केली. शेतकऱ्यांना या पिकाकडे वळण्याचे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, चिया पिकाला पेरणीपासून ते काढणीपर्यंत एकरी खर्च अत्यंत कमी आहे.या प्रात्यक्षिकामुळे जिल्ह्यात चिया लागवडीला नवी दिशा मिळत असून भविष्यात हे पीक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन ठरू शकते, अशाही पौर्णिमा सवाई म्हणाल्या. भातकुली तालुक्यातील खारपण पट्ट्यात या पिकाचा प्रयोग प्रथमच करण्यात येत आहे. गावातील अनेक शेतकरी अभिनव उपक्रमात सहभागी झाले आहेत. बाजारातील मागणी, किंमतीचा अभ्यास आणि पिकाची संपूर्ण माहिती घेऊन हा प्रयोग करण्यात आला आहे] असे मत कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. खारपण पट्ट्यात प्रथमच चियाचा प्रयोग: भातकुली तालुक्यातील खारपण पट्ट्यात या पिकाचा प्रयोग प्रथमच करण्यात येत आहे. गावातील अनेक शेतकरी अभिनव उपक्रमात सहभागी झाले आहेत. बाजारातील मागणी, किंमतीचा अभ्यास आणि पिकाची संपूर्ण माहिती घेऊन हा प्रयोग करण्यात आला आहे. चिया लागवड शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय ठरू शकतो, असे मत कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. कमी पाण्यात भरघोस उत्पादन, उबदार हवामानात उत्कृष्ट वाढ, फवारणीचा खर्च नाही, एकरी खर्च तुलनेने कमी, पौष्टिक मूल्यांनी समृद्ध: प्रथिने, फायबर, ओमेगा-३ फॅटी ऍसिड, कॅल्शियम व अँटिऑक्सिडंट्स विविध पदार्थांमध्ये वापर : नाश्ता, सलाड, दही, दूध, उपवासाचे पदार्थ, ब्रेड, बिस्कीट, लाडू, हलवा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी चिया वॉटर' व पेयांमध्ये वापर होतो. हरभऱ्याला पर्याय; चिया पिकाचे गावांमध्ये वाटप भातकुली तालुका खारपानपट्टा आहे. रब्बी पिकामध्ये हरभऱ्याला पर्यायी पीक म्हणून प्रायोगिक तत्त्वावर चिया लागवड मुख्यालयामध्ये काही गावांमध्ये प्रात्यक्षिक स्वरूपात राबवण्यात येत आहे. हरभरा पिकाच्या तुलनेत एकरी खर्च पेरणीपासून ते काढणीपर्यंतचा खूप कमी लागतो. चिया पिकाला बाजार भाव चांगला आहे. त्यामुळे हे प्रात्यक्षिक स्वरूपात गावांमध्ये वाटप करण्यात आले. त्याची पेरणी सुद्धा झालेली आहे. - रूपाली ठाकरे, सहाय्यक कृषी अधिकारी, टाकरखेडा संभू
येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्वंकष मूल्यांकनासाठी तज्ज्ञ पथकाची प्रत्यक्ष भेट
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रातील आरोग्य सेवांचे सर्वंकष मूल्यांकन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. यानिमित्ताने नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर, नवी दिल्ली आणि इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन यांच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्रातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन” सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कार्यरत प्राध्यापक, तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित मूल्यांकन अधिकारी यांची विशेष पथके जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची प्रत्यक्ष भेटी देत आहेत. गुरुवारी (ता. ४) या पथकाने येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी पथकाचे प्रमुख डॉ. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सय्यद आणि टीमने आरोग्य केंद्रातील सेवा, औषध साठा, आपत्कालीन सेवा, नोंदी व दस्तऐवजीकरण, स्वच्छता, पायाभूत सुविधा तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची बारकाईने पाहणी केली. येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रासह पानगाव–रत्नापूर उपकेंद्राचीही आज सखोल पाहणी करण्यात आली. पथकाने वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.डी. बिरादार, औषध निर्माता के.बी. गुरव, कक्ष अधिकारी बी.आर. स्वामी, ऐ.डी. वाघमारे, ऐ.एस. देशमुख (एच.ऐ.), एस.डी. गिरी, स्टाफ नर्स रोडगे, आशा सेविका ज्योती बारसकर यांच्याशी संवाद साधून दैनंदिन कामकाजातील अडचणी, सेवा पुरविताना येणारे अडथळे तसेच रुग्णांच्या गरजांची माहिती गोळा केली. सुरक्षिततेच्या मानकांचे परीक्षण पथकाने रुग्ण नोंदवही, औषध वितरण, लसीकरण कार्यक्रम, प्रसूती सेवा, कुपोषण निवारण, प्रयोगशाळेतील साधनसामग्री आणि स्वच्छता व सुरक्षिततेच्या मानकांचे सविस्तर परीक्षण केले. विशेषतः मातृ-शिशू आरोग्य सेवा, एड्स प्रतिबंधक कार्यक्रम, क्षयरोग निर्मूलन मोहिम आणि गैर-संसर्गजन्य आजारांच्या स्क्रिनिंगची प्रभावी अंमलबजावणी कितपत होत आहे, याची नोंद घेतली.
उत्तर सोलापूर तालुक्यात दत्त जयंतीनिमित्त भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्म यांचे अभूतपूर्व असे दर्शन घडले. परंपरेचा धागा आणि आधुनिक धार्मिक भावविश्व यांची सुंदर सांगड घालत या वर्षीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि समाधानकारक वातावरणात पार पडला. तालुक्यातील रानमसले, कळमण आणि कारंबा या गावांनी उत्सव साजरा करण्यासाठी जणू भक्ति पर्वाचा रंगच चढवला होता. काही ठिकाणी पहाटेच्या काकड आरत्या आणि मंदिरे फुलांनी सजवण्याची धांदल सुरू झाली होती. तर अनेक ठिकाणी पंचामृत महाभिषेक ही परंपरा शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. उजाडताच मंदिर परिसरात आध्यात्मिक स्पंदनांचा ओलावा जाणवत होता. महाभिषेकाच्या वेळी दत्त दत्त जय गुरुदत्त’ असा अखंड गजर आणि ढोल- ताशांच्या गजरात संपूर्ण वातावरण भारावून गेले. दुसरीकडे, काही ठिकाणी भजन आणि कीर्तन यांना प्रचंड प्रतिसाद लाभला. संत परंपरेचा वारसा पुन्हा एकदा उजळत, कीर्तनकारांनी दत्तावतारी तत्वज्ञान, दत्तभक्ती आणि सामाजिक संदेश यांचे सुरेल मिश्रण सादर केले. भक्तांना ज्ञान, भक्ती आणि मनोरंजन यांचे संतुलित सादरीकरण अनुभवायला मिळाले. उत्सवाच्या सर्वात आकर्षक पारंपरिक घटकांपैकी एक म्हणजे महाप्रसादाचे वितरण. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने प्रसाद स्वीकारत भक्तिभाव व्यक्त केला. प्रसादासाठी झालेली रांग उत्सवाच्या भव्यतेचे चित्रण करण्यास पुरेशी होती. दत्त प्रसादासाठी झालेली रांग उत्सवाच्या भव्यतेचे चित्रण करण्यास पुरेशी होती. दत्त प्रसादासाठी झालेली रांग उत्सवाच्या भव्यतेचे चित्रण करण्यास पुरेशी होती. दत्त महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीतून जिवंतपणे जाणवत होते की, अध्यात्मिक संस्कृतीचे केंद्रस्थानी असलेला हा उत्सव लोकांच्या मनात किती खोलवर रुजलेला आहे. अनेक भक्तांनी कुटुंबासह मंदिरात उपस्थित राहून दीर्घकाळ दर्शनाची वाट पाहिली तरी त्यांच्या चेहऱ्यांवर समाधान दिसत होता. उत्तर सोलापुरात साजरा झालेला यंदाचा दत्तजयंती उत्सव केवळ धार्मिक विधींची मालिका नव्हती. तर ती होती एक सामूहिक आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी अध्यात्मिक अनुभूती पाहायला मिळाली आहे. एकोप्याचा, संस्कृतीवरील प्रेमाचा आणि परंपरेचा शक्तिशाली संदेश गावागावात उत्साह, शांतता आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने तालुक्यात सर्वत्र आपल्या परंपरा अजूनही जिवंत आहेत असा विश्वास अधिक दृढ झाला. या सर्व धार्मिक कार्यक्रमांतून समाजातील एकोप्याचा, संस्कृतीवरील प्रेमाचा आणि परंपरेच्या सातत्याचा शक्तिशाली संदेश देत दत्तजयंती उत्सवाने या वर्षीही उत्तर सोलापूरच्या धार्मिक जीवनात अभिमानाची नवी नोंद करण्यात आली आहे.
अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने दत्त जयंती उत्सवाची सांगता शुक्रवारी सायंकाळी निघालेल्या श्रींच्या पालखी मिरवणुकीने झाली. दत्तजयंती निमित्त आज दुपारी १२ ते ३ या वेळेत वटवृक्ष देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या भक्त निवास येथील भोजनकक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आले. हजारो स्वामी भक्तांनी या भोजन महाप्रसादाचा लाभ घेतला. तदनंतर सायंकाळी ५ वाजता सदगुरू श्री स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीची प्रारंभीक आरती पुरोहित मोहन पुजारी, मंदार पुजारी यांचे हस्ते होऊन मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांचे हस्ते पालखी पूजन करून सालाबादप्रमाणे पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आले. यावेळी नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्री दत्तजयंती उत्सव पालखी मिरवणूक शुभारंभ करताना मंदार महाराज पुजारी, महेश इंगळे, अमोलराजे भोसले, प्रथमेश इंगळे व इतर दिसत आहेत. या पालखी मिरवणुकीत समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, मंदार महाराज पुजारी यांच्यासह सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त संपतराव शिंदे, यांच्यासह मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूर इत्यादी भागातून दिंडयांसह टाळकरी, विणेकरी, आदींसह हजारो स्वामी भक्त व दत्तभक्त स्वामी नामाच्या जयघोषात सहभागी झाले होते. ‘श्रीं’ची पालखी मिरवणूक अक्कलकोट शहरातील प्रमुख मार्गावरून बुधवार पेठेतील श्री स्वामी समाधी मठापर्यंत व तेथून परतीस रात्री साडे नऊ वाजता पालखी मिरवणूक वटवृक्ष मंदिरात आल्यानंतर सर्व स्वामी भक्त, सेवेकरी, टाळकरी, विणेकरी, भजनकरी आदींना देवस्थानच्या वतीने शिरा प्रसाद वाटप करून दत्त जयंती उत्सवाचा सांगता समारंभ झाला.
कुर्डूवाडी शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय गुरुवारी अक्षरशः ‘घंटी वाजली, कोणीच उठलं नाही’ अशा अवस्थेत आढळले.भर कामाच्या शासकीय वेळेत कार्यालयाच्या प्रवेश द्वारासह- कार्यालयालाच कुलूप, आणि आत कर्मचारी नाहीत असं विदारक दृश्य पहावयास मिळाले. सरकारी कार्यालये उघडी असतानाही कामे होत नाहीत, अश्या तक्रारी आपणास नेहमीच ऐकावयास मिळत असतात. मात्र कुर्डूवाडीतील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आणी सा. बा. विभागाचे अधिकारी मात्र शासकीय वेळेपूर्वीच कार्यालय सोडून पसार झाल्याचे स्पष्टपणे दिसले. थेट शासकीय कार्यालयच गायब मोडमध्ये गेल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या आणि सा.बा.विभागाच्या शिस्तीवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. एकीकडे शासनाच्या कडक नियमावलीला धरून चालणारे उत्पादन विभागाचे हे कार्यालयच जर जर शासकीय वेळेपूर्वीच बंद केले जात असेल, तर यांना शिस्त कशी आणि कधी लागणार, हा खरा प्रश्न आहे. या कलटीमार प्रकाराकडे वरिष्ठ अधिकारी ही गांभीर्याने पाहणार की नेहमीप्रमाणे ही आपल्या खालच्या अधिकाऱ्याविषयी मूकधारणाच करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातही भरदिवसाच शांतता होती. कामावर टांग मारण्याचे प्रकार सुरू मी देवदर्शनासाठी बाहेर आलोय ^तुम्ही कोण आहात. काय काम होतं का माझ्याकडे, काय काम असेल तर उद्या या भेटायला असे उद्धट उत्तर देऊन परत चुक लक्षात आल्यावर सावरा-सावर करुन मी रेड मारायला चाललोय असे सांगून चुकीवर पांघरुन टाकण्याचा प्रयत्न केला कुदळे, उपनिरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क कार्यालय) अधिकाऱ्यांचा बेशिस्तपणा, हलगर्जीपणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिस्त प्रिय मानले जातात.त्यांना कामात बेशिस्तपणा, हलगर्जीपणा अजिबात चालत नाही. राज्य उत्पादन शुल्क विभाग हा अजित पवारांकडे आहे.त्याच्याच खात्यात असे कलटी मार अधिकारी असतील तर काय बोलायचं आता. माढा विधानसभा निवडणुकीत मैदान मारल्यानंतर आमसभा घेऊन शासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. अजून वर्ष लोटले नसताना देखील शासकीय अधिकाऱ्याकडून मात्र कामावर टांग मारण्याचे प्रकार केले जात असल्याचे स्पष्टपणे पाहणीतून आढळले.
बार्शी बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दि. ७ रोजी मतदान होत आहे. सहकारी संस्था मतदारसंघातील वर्चस्वावर बाजार समितीचा कारभारी ठरणार असल्याने या मतदारसंघातील मतदाराला आपलेसे करण्यासाठी सरबराई सुरू आहे. एकूणच या गटातील मतदारांचा राजकीयदृष्ट्या चांगलाच भाव वधारला आहे. सहकारी संस्था मतदारसंघातून सर्वसाधारण प्रवर्गातील ७, महिला राखीव प्रवर्गातील २, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील १ व विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील १ असे ११ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. चार ही वेगवेगळ्या प्रवर्गासाठी वेगवेगळया रंगाच्या ४ स्वतंत्र मतपत्रिका आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातून सर्वसाधारण प्रवर्गातील २, अनुसूचित जाती,अनु.जमाती प्रवर्गाचा १, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा १ असे ४ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत मतदारसंघातील मतदारांना ४ मतांचा अधिकार आहे. प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळया रंगाच्या ३ स्वतंत्र मतपत्रिका आहे. हमाल-तोलार प्रतिनिधी मतदारसंघातून सदस्यपदाची १ जागा निवडून द्यावयाची असल्याने या मतदारसंघातील मतदारांना १ मताचा अधिकार आहे. सहकारी संस्था मतदारसंघाचे १६४५ मतदार, ग्रामपंचायत मतदारसंघाचे १०३९ व हमाल-तोलार मतदारसंघाचे १०२५ मतदारांना फक्त आपल्या मतदारसंघापुरतेच मतदान करण्याचा अधिकार आहे. जर उमेदवार पसंत नसेल तर वरीलपैकी एकही नाही (नोटा) असा पर्याय मात्र या मत पत्रिकेत उपलब्ध नाही. एका उमेदवाराला १ लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा आहे. निवडून आल्यानंतर ६० दिवसांपर्यंत निवडणूक खर्च सादर करायचा आहे. मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून निवडून आलेल्या उमेदवारांनी एक वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा अशांचे संचालकपद रद्द ठरू शकते. मतपत्रिका कोरी असेल तर बाद होईल, एका मतपत्रिकेवर जेवढी मते टाकण्याचा अधिकार आहे, त्यापेक्षा जादा मते टाकली तर बाद होईल. बाणफुलीचा शिक्का मारण्याऐवजी अंगठा केला तर बाद होईल. एका मतपत्रिकेवर एकापेक्षा अधिक मते देण्याचा अधिकार असताना त्यापैकी एखादी बाणफुली संशयास्पद म्हणजे बरोबर मध्यभागी मारली असेल ते ओळखू येत नसेल तर इतर स्पष्ट मते ग्राह्य धरणार. आबासाहेब गावडे, निवडणूक निर्णय अधिकारी ..अन्यथा अशांचे संचालक पद ठरू शकते रद्द
पापरी पीएमश्री जि.प.प्राथमिक आदर्श शाळेत विद्यार्थीच बनले शिक्षक, शिक्षकांच्या भूमिकेत जाऊन सवंगड्यांना पाठ्यपुस्तकातील धडे शिकवीत फळ्यावर जोड शब्दलेखन, अंक ओळख यासह गणिते सोडवून घेतली. कोन्हेरी केंद्रात १५ पैकी फक्त २ शाळा नियमित सुरू होत्या. ‘कधीच बंद नसणारी शाळा' म्हणून असणाऱ्या ओळखीची परंपरा विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून कायम ठेवली आहे. पापरी ता.मोहोळ येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा ही शैक्षणिक गुणवत्तेसह इतर सामाजिक,पर्यावरण पूरक तसेच विद्यार्थी विकास केंद्रित उपक्रम राबविण्यात व पटसंख्येत जिल्ह्यात अग्रेसर असून या शाळेची सध्याची इयत्ता १ ली ते ८ वीची एकूण विद्यार्थी पटसंख्या सध्या ८५७ इतकी आहे. शाळेतील शिक्षक शाळेच्यावेळे व्यतिरिक्त अतिरिक्त विनामूल्य तासिका घेत विद्यार्थ्यांना शिक्षण देत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता दिसून येते. दिवाळी उन्हाळी तसेच शनिवार, रविवार इतर सुट्टीच्याही दिवशीही शाळा अविरत सुरू असते त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यात ‘कधीच बंद नसणारी शाळा' म्हणूनही शाळा ओळखली जाते. ५ डिसेंबर रोजी या शाळेतील १२ शिक्षक शिक्षक संपात सहभागी झाले होते तरीही शालेय वेळापत्रकावर त्याचा परिणाम जाणवला नाही.कारण शाळेतील विद्यार्थीच दैनंदिन तासिका वेळापत्रकाप्रमाणे सदर विषयाचे शिक्षक बनून आपल्या मित्र-मैत्रिणींना शिकवत असतानाचे चित्र शाळेत दिसून येत होते. कोन्हेरी केंद्रात एकूण १५ जिल्हा परिषद शाळांचा समावेश होतो त्यातील फक्त पीएम श्री आणि खंडाळी येथील इंगोलेवस्ती शाळा या दोनच शाळा नियमित प्रमाणे सुरू असल्याचे केंद्रप्रमुख ऋषी जगताप यांनी सांगितले. शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणाऱ्या निर्णयासोबत विविध मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी शुक्रवारी (५ डिसेंबर) राज्यव्यापी संप संपाची हाक दिली.या संपात पापरी शाळेतील शिक्षकही सहभागी झाले होते.पीएम श्री शाळेत मुख्यध्यापकासह १८,अंशकालीन ३ आणि लोकवर्गणीतून २ असे २३ शिक्षक शिक्षिका दैनंदिन कार्यरत असतात,यातील १२ जण राज्यव्यापी संपात सहभागी झाले होते,त्याचा शालेय वेळापत्रकावर परिणाम होतो की काय अशी साशंकता होती. मात्र वर्गातील मॉनिटर असणाऱ्या हुशार विद्यार्थी विद्यार्थिनींनी पुढे येत विषय तासिका वेळापत्रकाप्रमाणे शिक्षकांची भूमिका निभावत आपल्या मित्र मैत्रिणींना पाठ्यपुस्तकातील धडे देत त्यांच्याकडून शब्दलेखन,अंक ओळख,यासह गणितेही सोडवून घेतली. पापरीच्या शाळेबरोबरच सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद वस्ती शाळेचे ‘रोल मॉडेल' म्हणून ओळख असलेल्या कोन्हेरी केंद्रातीलच खंडाळी येथील इंगोले वस्ती शाळाही नियमित सुरू होती.या शाळेची इयत्ता १ ली ते ४ थी ची एकूण विद्यार्थी पटसंख्या १५६ असून ५ शिक्षक कार्यरत असून त्यापैकी २ शिक्षक राज्यव्यापी संपात सहभागी झाले असल्याची माहिती दिली. ^शाळेत वर्गावर आज शिक्षक आले न्हवते. त्यामुळे आम्हीच रिव्हिजन, शुद्धलेखन, इंग्रजी शब्दांची ओळख व त्याचे स्पेलिंग लेखन आदी नियमित वर्गात शिक्षक घेतात. तशा तासिका घेत शिक्षकांची उणीव भासू दिली नाही. मी स्वतः इंग्रजीचा तास घेतला. शिक्षक दररोज आपणास कसे शिकवितात हे अनुभवले. माझ्या मित्र-मैत्रिणींनाही ते छान वाटत होते, कारण ते शिक्षकांप्रमाणेच मला प्रतिसाद देत होते. श्रुती जगताप (विद्यार्थिनी, इयत्ता ३ री ) ^पापरीच्या पीएमश्री शाळेस तालुक्यासोबतच जिल्ह्यातील अनेक जि.प.शाळांची मार्गदर्शक व प्रेरणादायी शाळा म्हणून संबोधले जाते,येथील पालक,ग्रामस्थ आणि शिक्षक यांच्यात शिक्षणाबद्दल शाळेबद्दल भरपूर सकारात्मकता आहे. तीच सकारात्मकता या विद्यार्थ्यांत आहे ती आजच्या कार्यातून दिसून आली.ही बाब अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे. अविचल महाडिक, मोहोळ,तालुका गटशिक्षणाधिकारी
मोहोळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ५३ हजार २६० बाधित शेतकऱ्यांसाठी ८१ कोटी २० लाख २४२ रुपये अनुदान मंजूर झाले असून ६४ कोटीहून अधिक रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. अद्यापही २ हजार ७५६ शेतकऱ्यांनी ई- केवायसी केली नसल्याने ते यापासून वंचित राहिले असून सदर शेतकऱ्यांनी ई- केवायसी पूर्ण करत फार्मर आयडी कार्ड काढून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सचिन मुळीक यांनी केले आहे. तालुक्यात अतिवृष्टीने फळबागा, कांदा, मका,तूर आदी फळबागा आणि पिकांचे नुकसान झाले होते, तहसीलदार सचिन मुळीक, तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावकामगार तलाठी,सहायक कृषी अधिकारी यांनी पंचनामे केले होते. याबाबत अधिक माहिती देताना तहसीलदार मुळीक म्हणाले की, मोहोळ तालुक्यात अतिवृष्टीने ५३ हजार २६० शेतकऱ्यांचे ७६ हजार २१२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून यासाठी शासनाकडून ८१ कोटी २० लाख २४२ रुपये अनुदान मंजूर झाले आहेत. त्यातील शून्य ते ^ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नाही. अशा शेतकऱ्यांनी महा ई-सेवा केंद्रावर जाऊन फॉर्मर आयडी काढून घ्यावा. तसेच ई- केवायसी करून घ्यावी. ई-केवायसी केल्यावरच शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे. सचिन मुळीक, तहसीलदार, मोहोळ ते २ हेक्टर क्षेत्र बाधित असलेल्या ५१ हजार ४८६ शेतकऱ्यांसाठी ६३ कोटी ३८ लाख ४६ हजार ३६ रुपये तर २ ते ३ हेक्टर क्षेत्र बाधित असलेल्या १ हजार ७७४ शेतकऱ्यांसाठी १ कोटी ५० लाख ५३ हजार २५२ रुपये अनुदान मंजूर झाले आहे. अद्यापही २ हजार ७५६ शेतकऱ्यांनी ई- केवायसी केली नसल्याने त्यांचे ३ कोटी १० लाख २९ हजार ५७८ रुपये खात्यावर शिल्लक दिसत असल्याची माहिती मुळीक यांनी सांगितली. शेतकऱ्यांनी ई- केवायसी करून घ्यावी
राजकीय पटलावर नेहमीच चर्चेत असलेल्या ‘नगर-मनमाड’ रस्त्याचे काम सध्या सुरु असले तरी ते धिम्या गतीनेच सुरु आहे. त्यामुळे ‘नगर- मनमाड’चा प्रवास खडतरपणे सुरुच आहे. या रस्त्यावर सध्या बहुतेक ठिकाणी कामे सुरु असल्यामुळे वाहतूकीचा वेग मंदावलेला असतानाच याच कामामुळे रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता ‘नगर-मनमाड’ रस्त्यावर असलेल्या राहुरी महाविद्यालयासमोर एका चारचाकी वाहनाला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले. लक्ष्मीबाई बाळासाहेब साळवे (४७) रा. बारागांव नांदूर, ता राहुरी या असे मृत महिलेचे नाव आहे. या रस्त्यावर गेल्या २४५ दिवसांत १४३ अपघात झाले. त्यात आत्तापर्यंत ७१ जणांचे बळी गेले आहेत. गेल्या ८ महिन्यात या रस्त्याचे अवघे ८ टक्के काम पूर्ण झाले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप यांच्या मतदार संघातून नगर-मनमाड रस्ता जातो. २०१९ पासून या रस्त्याचे काम रखडत-रखडत सुरु आहे. यापूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होते,२०२१ मध्ये हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गेला होता. यापूर्वी या रस्त्याच्या कामासाठी दोन वेळा निविदा निघाल्या होत्या, मात्र दोन्ही वेळा हे काम पूर्ण होऊ शकले नाही, गेल्या सहा महिन्यांपूर्वी निविदा प्रसिध्द होऊन या कामाला सुरुवात झाली होती. मात्र काम वेग धिमा आहे. त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत. शुक्रवारी पुन्हा या रस्त्यावर झालेल्या अपघातात लक्ष्मीबाई बाळासाहेब साळवे (४७) रा. बारागांव नांदूर, ता राहुरी या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मार्च २०२५ ते ५ डिसेंबर २०२५ पर्यंत या २४५ दिवसांत या रस्त्यावर १४३ अपघात झाले, त्यात ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ ते आतापर्यंत या रस्त्यावर ४२३ जणांचा अपघातात मृत्यू झाला . जूनमध्ये एकाच आठवड्याच ४ जणांचा मृत्यू झाला होता. अहिल्यानगर-मनमाड रस्त्याचे काम धिम्यागतीने सुरू आहे. दक्षिणेतून शिर्डी, शनिशिंगणापूरला जाणाऱ्या भाविकांना याच नगर-मनमाड रस्त्याने जावे लागते, भाविक अगोदर शिर्डीला जातात, नंतर तेथून ते शिंगणापूरला जातात, गेल्या ६ वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे भाविकांनी प्रवासाचा रुट बदलला आहे. ते मनमाड ऐवजी पुणे-संगमनेर येथून शिर्डीला येत आहेत. दरम्यान, या रस्त्यावर कुठेही दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळेही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरु करण्यात आल्यामुळे या रस्त्यावरील अवजड वाहतूक यापुर्वी दोन वेळा छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर -पुणे रस्त्याने वळवण्यात आली होती. सध्या छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर -पुणे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, याची तात्पुरती डागडुगी सुरु असली तरी नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतूकीचा अतिरिक्त ताण संभाजीनगर रस्त्यावर पडत आहे. त्याचा परिणाम वाहतूकीवर होऊन वाहतूक ठप्प होत आहे.
नगर जिल्ह्याला संत परंपरेचा आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. ही परंपरा जोपासण्याचे आणि दिवसेंदिवस समृद्ध करण्याचे काम ग्रामीण भागातील वारकऱ्यांनी केले आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक हभप ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांनी व्यक्त केले. सद्गुरु साहेबराव आवारे यांच्या अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सद्गुरु साहेबराव आवारे प्रतिष्ठानतर्फे वारकऱ्यांचा ग्रंथसंपदा व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी हभप सिद्धिनाथ मेटे महाराज, कवी प्रा. शशिकांत शिंदे, डॉ. संजय बोरुडे, अशोक निंबाळकर, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप शेटे, सचिव नवनाथ मगर, साहित्यिक सचिन चोभे आदी उपस्थित होते. बंडगर महाराज पुढे म्हणाले, ‘संताची शिकवण ही आपल्या जगण्याचा भाग बनविणे गरजेचे आहे. संत विचारांचे आचरण करणाऱ्या वारकऱ्यांचा सन्मान करणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. या कर्तव्य भावनेतूनच प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘वारकरी सन्मान’ करण्यात आला ही अभिमानाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे समाजाला निश्चितपणे योग्य दिशा मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सूर्यकांत वरकड यांनी तर आभार सचिव नवनाथ मगर यांनी मानले. यावेळी परिसरातील नागरिक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. वारकऱ्यांचा प्रतिष्ठानने केला सन्मान सद्गुरू श्री साहेबराव आवारे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जेऊर आणि परिसरातील वारकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. हभप मच्छिंद्र तवले, हभप रघुनाथ तोडमल, हभप सुदाम दारकुंडे, हभप रमेश चौधरी, हभप चांगदेव आठरे, हभप शरद नाना तवले महाराज, हभप दत्तात्रय खांदवे महाराज आदी वारकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
आपण भारताची संस्कृती ही जोपासली पाहिजे आणि ती जोपासून ती विद्यार्थ्यांच्या अंगी रुजली पाहिजे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान आवश्यक आहे. जगात टिकायचे असेल तर आलेल्या संकटावर मात करुन पुढे जात रहावे व स्वतः मध्ये बदल करा. मोबाइल व टीव्हीमध्ये गुंतून न जाता मैदानी खेळ खेळले पाहिजेत. व्यायाम केला पाहिजे, आपल्याला आपले जीवन वाचवायचे असेल तर कसरत केली पाहिजे. जंक फूड व फास्ट फूड खाणे टाळा, आणि पोषक आहार घ्या, असे आवाहन डॉ. विवेकानंद चेडे यांनी केले. केडगाव येथील डॉ. हेडगेवार शैक्षणिक संकुल संचलित सरस्वती प्राथमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन डॉ. विवेकानंद चेडे व डॉ. पल्लवी चेडे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी बी. एड. कॉलेजचे प्राचार्य अमरनाथ कुमावत, मयुर बांगरे, गोकुळदास लोखंडे, संभाजी पवार, शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर, मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी आदी उपस्थित होते. या बाल आनंद मेळाव्यात विविध साहित्याचे प्रदर्शन, समाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या आणि विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान होण्यासाठी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल थाटण्यात आले होते. विविध उद्योगांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. बाल आनंद मेळावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह पालकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता खिलारी यांनी केले. आभार अनिता क्षीरसागर यांनी मानले. सर्व शिक्षकानी आनंद मेळाव्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. मेळाव्यातील स्टॉलवर वाढली गर्दी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि कौशल्य विकास होण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी मुलांनी भेळ, पॅटिस, पाणीपुरी, ढोकळा, इडली, मॅगी, तसेच शरीरासाठी पोषक असे पालेभाज्या व फळे हेही विक्रीसाठी आणण्यात आले होते.
भूसंपादन भरपाई प्रलंबित जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांना कायद्यानुसार चालू बाजारभावाच्या चारपट भरपाई मिळणे अपेक्षित आहे. ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत राळेगण थेरपाळ ते बेल्हा महामार्गाबाबत काम बंदचा निर्णय घेऊन शुक्रवारचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. सकाळी दहा वाजता सुरू झालेले रास्ता रोको आंदोलन दोन तास सुरू होते. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी तक्रारीचा पाढाच वाचला. तर तातडीने हे काम बंद करण्याची मागणी केली. यावेळी माजी सरपंच ठकाराम लंके, राष्ट्रवादीचे पदाधिकारी जितेश सरडे, माजी उपसभापती खंडू भुकन, बाबासाहेब कवाद निघोज नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव थोरात, सुभाष वराळ, दत्तात्रय लाळगे, भिमाशेठ घुले, विश्वासराव शेटे, ॲड.बाळासाहेब लामखडे, वसंत ढवण, पांडुरंग पठारे, रुपेश ढवण, माजी उपसरपंच उमेश सोनवणे, ज्ञानेश्वर लंके आदी उपस्थित होते. अद्याप अनेक प्रकरणे निकाली निघालेली नाहीत. काही ठिकाणी मोजणीच पूर्ण न झाल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रस्ता आणि ड्रेनेज उंचीकरणाबाबत समस्या गावाच्या परिसरात रस्त्याची उंची व ड्रेनेजचे नियोजन विसंगत झाल्याने पाणी साठणे, घरांमध्ये पाणी शिरणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याचा धोका असल्याची तक्रार करण्यात आली आहे. यावेळी ग्रामपंचायत आणि शासकीय संपत्तीचे नुकसान रस्त्यालगतची झाडे, ग्रामपंचायतींच्या मालमत्ता तसेच शासकीय संपत्तीचे नुकसान होत आहे. त्याबाबतच्या भरपाईसंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही. सिंचनासाठी युटिलायझेशन पाइपची मागणी, शेतीसाठी महामार्गाखाली आवश्यक असलेली युटिलायझेशन पाईपलाइन बसविण्याचे काम दुर्लक्षित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रत्येक १०० मीटरवर पाइप सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. बस थांबे आणि सर्विस रोडची आवश्यकता प्रत्येक गावात अधिकृत बस थांबा आणि निघोज सारख्या मोठ्या गावांमध्ये सर्विस रोडची गरज व्यक्त करण्यात आली आहे. अन्यथा वाहतूक धोक्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, असे ग्रामस्थांचे मत आहे. पठारवाडी फाटा आणि इतर काही ठिकाणी मोजणीतील चुका झाल्याचे नमूद करत दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांशी उद्धट वागणूक दिल्याची तक्रारही करण्यात आली आहे. मिळणारी उत्तरे केवळ आश्वासनापुरतीच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे. मिळणारी उत्तरे केवळ आश्वासनापुरतीच असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी बोलताना उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी वरील मागण्या प्रामुख्याने केल्या. या मागण्या मंजूर जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत हे काम बंद ठेवण्यात येणार आहे. रात्री अपरात्री हे काम सुरू झाल्यास याची जबाबदारी संबंधीतांवर राहील, असा इशारा यावेळी करण्यात आला.
जुन्नर तालुक्यात शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार झपाट्याने वाढत असून,आळेफाटा, राजुरी परिसराने तर यंदा थेट ‘डिजिटल शेती’चे पाऊल टाकले आहे. सोयाबीन आणि ऊस पिकांवर पहिल्यांदा ड्रोनद्वारे औषध फवारणी होताच परिसरातील शेतकरी आधुनिक शेतीचे फायदे प्रत्यक्ष अनुभवू लागले आहेत. पारंपरिक पद्धतीने पंपाने फवारणी केल्यास : एकरी खर्च : १२००–१३०० रुपये,वेळ जास्त, रसायने अधिक ड्रोनद्वारे फवारणी केल्यास : एकरी ठोक भाव : ८०० रुपये, तीन एकरवर फक्त १००० रुपये!,रसायनांचा वापर २०-३० टक्क्यांनी कमी,फवारणीचा वेग ५ पट जास्त हा आर्थिक फरक पाहून शेतकऱ्यांचे“तंत्रज्ञ ान वापरल्याशिवाय नफा मिळणे कठीण, ड्रोन हे आता तारणहार, असल्याचे स्पष्ट मत आहे. इस्राईलहून आयात केलेले हे ड्रोन पूर्णपणे बॅटरीवर चालते. १० लिटर क्षमतेमुळे एकाच वेळेस मोठ्या क्षेत्रावर फवारणी करता येते.असे ड्रोन चालक नारायण भापकर सांगतात, मशिन महाग असलं तरी शेतकऱ्याला प्रति एकर ४०-५०% बचत करून देते. त्यामुळे त्याला झपाट्याने मागणी वाढत आहे. हे ड्रोन सोयाबीन, हरभरा, तूर, मका, गहू, बाजरी, मूग-उडीद यांसह ऊसावरदेखील पूर्ण प्रभावी. ऊस उत्पादक सुरेश कुऱ्हाडे यांचे म्हणणे आहे की, ड्रोनमुळे खत व औषध फवारणी एकसारखी होते. कांड्यांची वाढ झपाट्याने होते. त्यांच्या मते, ड्रोन फवारणीमुळे यंदा १०–१५ हजार रुपयांची थेट बचत होणार आहे. कमी खर्च लागत असल्याने शेतकऱ्यांचा ड्रोन फवारणीकडे कल वाढला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी अनिवार्यतेवरील निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात शासनाकडून होत असलेला विलंब चिंताजनक आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने टीईटी निकालाचा चुकीचा अर्थ काढून सुरू केलेल्या कारवाया तात्काळ थांबवाव्यात, शासनाने शिक्षकांवर लादलेली टीईटी सक्ती रद्द करावी, प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ निर्णय घ्यावा, या प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना देण्यात आले. अशी मागणी शिक्षकांच्या वतीने करण्यात आली. जिल्हा प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने टीईटी सक्ती, जुनी पेन्शन, रिक्त पदभरती आदी दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाप्रसंगी आमदार सत्यजित तांबे, शिक्षक नेते प्रवीण ठुबे, रावसाहेब रोहोखले, संजय कळमकर, आबासाहेब जगताप, संजय धामणे, भास्कर नरसाळे, अविनाश निंभोरे, सुनील पंडित, महेश हिंगे, दिनेश खोसे, शरद कोतकर, संतोष सरोदे, राम कदम, बाबासाहेब बोडखे, रघुनाथ झावरे, अमित पन्हाळे, सिताराम सावंत, तौसीफ सय्यद, दत्ता जाधव, विजय महामनी, गणेश वाघ, बाळासाहेब रोहकले, विजय देठे, आप्पासाहेब जगताप, जयश्री झरेकर, आप्पासाहेब शिंदे तसेच जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी. शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी १०-२०-३० वर्षांनंतरची सुधारित वेतन-प्रगती योजना लागू करावी. १५ मार्च २०२४ चा संच मान्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा. राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बंद असलेली भरती सुरू करावी, तसेच सर्व रिक्त पदे १०० % भरण्यात यावीत. शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक व ऑनलाइन कामे तत्काळ थांबवावीत. विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी भेदभाव न करता मंजूर करावी. वस्ती शाळेतील शिक्षकांना नियुक्ती तारखेपासून सर्व सेवा लाभ लागू करावेत. आश्रमशाळांतील कंत्राटी भरतीचे धोरण रद्द करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. कमी पटाच्या शाळा न बंद करता शिक्षक क्रम सुरू ठेवा अल्पसंख्याक शाळांना स्वमान्यता व नियुक्ती मान्यतेसाठी विशेष सवलत द्यावी. कमी पटाच्या शाळा न बंद करता शिक्षक क्रम सुरू ठेवावा. शिक्षकांच्या मागण्या अनेक वर्ष प्रलंबित राहिल्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. शासनाने तातडीने सकारात्मक दृष्टीकोनातून निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या न मानल्यास राज्यभर शाळा बंद ठेवून मोठ्या आंदोलनाचा इशारा संघटनेकडून देण्यात आला.
राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत चैताली राठोड तिसरी
बारामती (पुणे) येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चैताली अनिल राठोड हिने १९ वर्षांआतील वयोगटातील कराटे स्पर्धेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे यांनी तिचे अभिनंदन करत आगामी स्पर्धेसाठी तिला आर्थिक मदतीचा आधार दिला. तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या चैतालीने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर शिक्षणाबरोबरच कराटे स्पर्धेत भाग घेऊन हे यश संपादन केले आहे. या आधी चैतालीने जिल्हास्तरावर तसेच विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकवात राज्य स्तरावर निवड झाली होती. विभागीय स्तरावर विजयी झालेल्या अनेक दिग्गज खेळाडूंनी राज्यस्तरावरील कराटे स्पर्धेत भाग घेतला होता. अनेक खेळाडूंना मात देत चैतालीने अंतिम सामन्यात हे यश संपादन केले या यशाने कळवण तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच चैतालीने एक आदर्श घालून दिला आहे. चैतालीचे या कामगिरीमुळे सर्वच स्तरावरून तिच्यावर कौतुकांचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चैतालीच्या या यशामागे क्रीडाशिक्षक व प्रशिक्षक सोहन शिरसाठ, नीलेश गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले. आजी, आजोबा, काका, काकू, आई, वडील, भाऊ, बहीण यांचे सहकार्य लाभले.
दिंडोरी तालुक्यातील करंजी येथे दत्तजन्मोत्सव उत्साहात पार पडला. दत्तात्रेयांचे आजोळ आणि महर्षी कर्दम ऋषींचे आश्रम म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली. साधारण दोन ते अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतले, तर जवळपास दोन लाखांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती आयोजकांनी दिली. दत्त जयंतीच्या दिवशी पहाटे चार वाजता दत्त्यागास सुरुवात झाली. साडेआठपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहिला. त्यानंतर विधिवत पूजा आणि सकाळी नऊ वाजता महापूजा पार पडली. अभिजित महाराज राजापूरकर यांच्या उपस्थितीत आठवडाभर चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहामुळे दररोज कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन झाले. शेवटच्या दिवशी गोपाळकाला आणि काल्याचे कीर्तन झाले. दुपारी बारा वाजल्यापासून महाप्रसादास सुरुवात झाली आणि अंदाजे एक लाख पंच्याहत्तर हजार भाविकांनी प्रसाद घेतला. शिवदास महाराज यांच्या संकल्पनेनुसार करंजीत विविध धार्मिक उत्सव सातत्याने साजरे केले जातात. येथील गोड्या पाण्याची गंगा म्हणून ओळखली जाणारी जिवंत पाण्याची जागा प्रसिद्ध आहे. तसेच जगात एकमेव पद्मासनस्थित श्री दत्तात्रयांची मूर्ती येथे प्राचीन काळापासून सुस्थितीत आहे. कर्दम ऋषींप्रमाणेच येथे शिवदायल स्वामी, सद्गुरू रामचंद्र महाराज, जोशी महाराज यांनी या देवस्थानची परंपरा वैदिक पद्धतीने सुरू ठेवली. उत्सवकाळात पार्किंग व्यवस्था चोख असल्याने भाविकांना त्रास झाला नाही. पहाटे चार वाजेपासून सुरू असलेल्या उत्सव साडेअकरा- बारा वाजेदरम्यान करंजी येथून गडावर भगवतीच्या दर्शनाला गेलेले भाविक परत करंजी येथे आल्यानंतर समाप्त झाला. - दत्तात्रय पाटील, अध्यक्ष, करंजी देवस्थान
आदिवासी परंपरेची देवदिवाळी असणारा डोंगऱ्यादेव उत्सवाला मोठ्या जोशात सुरुवात झाली आहे. पारंपरिक संगीत आणि नृत्याच्या सुरांसोबत घुंगूरकाठी-पावरीचा सूर डोंगरदऱ्यांमध्ये घुमत असून घुंगूरकाठी, पावरी, बांबूचा टापरा, डफडी आणि तालबद्ध टाळ्यांच्या नादात रानवाटा, डोंगर कडे आणि कडेकपारी या उत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाल्या आहेत. डोंगऱ्यादेव उत्सव हा निसर्गपूजेला आधारलेला वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. डिसेंबर महिन्यात आमावास्येनंतर या उत्सवाची सुरुवात होताच कळवण, वंजारी, कुंडाणे, नांदुरी, आठांबे, ओझर, साकोरे, बोरदैवत, ढेकाळे, जामले, बेंदीपाडा, तसेच सुरगाणा, दिंडोरी, बागलाण, साक्री ते नंदुरबारपर्यंतचा आदिवासी भाग पौर्णिमेपर्यंत आनंदोत्सव सुरू राहणार आहे. हा उत्सव सर्व गाव मिळून साजरा करत असल्याने त्यास ‘भाया’ असे संबोधले जाते. भगत, कथकरी, पावरीवादक पावरकर आणि डफडी वाजविणारा ढोलकर यांची जमवाजमव केली जाते. रात्री कथकरी थाळीवाद्याच्या सुरावर कणसरा माता, झेडूबाळ, भुताच्या कथा अशा विविध दंतकथा सांगत असतो. थोंबाजवळ कणसरा माता, उन्हाबाळ, मुंज्या, घुंगूरकाठी आणि काकडीचा बाळ यांची विधिवत पूजा केली जाते. सात ते आठ दिवस मावल्या पावरी व डफडीच्या तालावर थोंबाजवळ फेर धरून नृत्य करतात. सकाळी मावलींचा फड गावोगाव फिरून पावरीच्या तालावर नृत्य करीत कमारी गोळा करतो. गावकरी शेंगा, भाजलेला मका, गूळ यांचा फराळ देतात. नवव्या दिवशी गावाच्या गडावर – कणसरागड, रेशम्यागड, नंडग्यागड, मांडवगड किंवा शेंदोडगड चढून डोंगरमाउलीची पूजा केली जाते.
दोन महिन्यांपूर्वी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ८२ हजार शेतकऱ्यांना फटका बसला होता. पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाकडून दिवाळीपूर्वी अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ११ हजार ९ शेतकऱ्यांची यादीच अपलोड झालेली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. या शिवाय दोन शिवारांमध्ये जमीन असल्यामुळे ४५०० शेतकऱ्यांनाही अजून मदत मिळालेली नाही. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते. यात तालुक्यातील १३१ गावांतील ८२ हजार २३५ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले होते. यापैकी शासनाच्या पोर्टलवर महसूल प्रशासनाकडून ७१ हजार २२६ शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात आली. यामुळे त्यांना नुकसान भरपाईचे अनुदान बँकेमार्फत प्राप्त झाले. उर्वरित ११ हजार ९ शेतकऱ्यांची यादी अद्यापही अपलोड झालेली नसल्याने शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्र शासनाने दिनांक २७ मार्च २०२३ च्या एनडीआरएफच्या शासन निर्णय तरतुदीनुसार निधी मंजूर केला आहे. त्याची मर्यादा ०२ हेक्टरपर्यंत आहे. त्यात राज्य शासनाने वाढ करून ०३ हेक्टर मर्यादेपर्यंत अनुदान मंजूर केले होते. अकाउंट नंबरसह आधार कार्डची प्रत द्या शेतकऱ्यांनी प्रथम आपला डेटा फार्मर आयडीला मॅच होतो की नाही, हे तपासावे. जर तुमचा डेटा फार्मर आयडी कार्डला मॅच होत नसेल तर ई-केवायसी तातडीने करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांची दोन शिवारांमध्ये जमीन आहे, परंतु निधी मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तलाठ्याकडे संमतीपत्र, बँकेचे अकाउंट नंबरसह आधार कार्डची प्रत देणे गरजेचे आहे. २ दिवसांत प्रक्रिया पूर्ण करू ^मागील सहा दिवसांत ६५ टक्के शेतकऱ्यांच्या केवायसी पूर्ण करून घेण्यात आलेल्या आहेत. उर्वरित ३५०० केवायसी दोन दिवसांत पूर्ण करण्यात येतील. तसेच दोन शिवारांमुळे होल्ड झालेल्या शेतकऱ्यांच्या ०२ हेक्टरपेक्षा अधिकच्या क्षेत्राची मागणी नोंदविण्यात येईल. शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत अनुदान जमा होईल, याची दक्षता घेतली जात आहे. -संजय देवराय, तहसीलदार
शाश्वत शेती उपकरणाला प्रथम क्रमांक; जिल्हास्तरावर निवड:सोयगावला 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
पंचायत समिती सोयगाव अंतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव यांच्या नियोजनातून ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनात प्राथमिक गटातून केंद्रीय प्राथमिक शाळा (सोयगाव) येथील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शाश्वत शेती उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. या प्रकल्पाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. प्राची सोनवणे, शुभ्रा सोहनी आणि जयश्री कोळी या विद्यार्थिनींनी हा प्रकल्प सादर केला. मुख्याध्यापक किरणकुमार पाटील आणि शिक्षक रामचंद्र महाकाळ यांचे मार्गदर्शन लाभले. प्रदर्शनात विज्ञानाची दिशा, तंत्रज्ञानातील प्रगती आणि विद्यार्थ्यांची सर्जनशीलता यांचे दर्शन घडले. विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, ऊर्जा व्यवस्थापन, कृषी तंत्रज्ञान, आरोग्य विज्ञान, रोबोटिक्स आणि डिजिटल कल्पना यावर आधारित मॉडेल्स सादर केली. प्रत्येक प्रकल्पातून वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता दिसून आली. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी कार्यालयाचे पाटील, सोयगाव केंद्राचे केंद्रप्रमुख फिरोज तडवी, सावळदबारा केंद्राचे केंद्रप्रमुख जनार्धन साबळे उपस्थित होते. गटसाधन केंद्राचे सुनील बावचे, कैलास लांडगे, जगन्नाथ काकडे आणि प्रतिज्ञा सोनवणे यांनी सहकार्य केले. डॉ. एस. एल. पाटील, जाधव आर. टी. आणि शेख टी. आर. यांनी प्रकल्पांचे मूल्यांकन केले. विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन दिले.
शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली आहे. या निर्णयाच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वतीने ५ डिसेंबर, शुक्रवार रोजी राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. यात वैजापूर तालुक्यातील खंडाळा, बोरसर, आणि जानेफळ केंद्रातील मोठा सहभाग दिसून आला. ५९ शाळांपैकी ३७ शाळा शंभर टक्के बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे आज शिक्षकांविना शाळांचे चित्र दिवसभर बघायला मिळाले. काही शाळांमध्ये एका शिक्षकाने चार वर्गांच्या विद्यार्थ्यांना दिवसभर अध्यापन केले. संपामध्ये प्रमुख मागण्या होत्या पुढीलप्रमाणे शिक्षकांना सक्तीने टीईटी परीक्षा देण्याचा निर्णय मागे घ्यावा. अन्यायकारक संचमान्यता रद्द करावी. विद्यार्थी पटसंख्येची अट शिथिल करावी. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी. आश्वासित प्रगती योजना (१०/२०/३०) लागू करावी. मराठी शाळा वाचवा. स्वयंअर्थसहाय्यित शाळा देणे बंद करा. वृहत आराखड्यानुसार शाळांना विनाअनुदान तत्वावर मान्यता द्या. सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी. वस्तीशाळा शिक्षकांची मागील सेवा मुळ नियुक्ती तारखेपासून सर्व लाभांसाठी ग्राह्य धरावी. टीईटी निर्णयावरील पुनर्विचार याचिका राज्य शासनाने तातडीने दाखल करावी. शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी. राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पदभरती तात्काळ सुरू करावी. शिक्षकांवरील विविध अशैक्षणिक व ऑनलाईन उपक्रम तात्काळ थांबवावेत. कमी पटाच्या शाळा बंद न करता शिक्षणक्रम सुरू ठेवा. आश्रमशाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करावे. १५ मार्च २०२४ चा संचमान्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा. टीईटी निकालाचा चुकीचा अर्थ काढून विविध कार्यालयांकडून सुरू असलेली कार्यवाही तात्काळ थांबवावी. या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपामध्ये वैजापूर तालुक्यातील खंडाळा, बोरसर, आणि जानेफळ या तीन केंद्रातील कार्यरत २१० शिक्षकांपैकी १३७ शिक्षक सामूहिक रजेवर तर १५ शिक्षक इतर रजेवर गेले. त्यामुळे ५९ शाळांपैकी ३७ शाळा बंद असल्याचे चित्र बघायला मिळाले. १० शाळा सुरू, १० शाळा बंद जानेफळ केंद्रांतर्गत २० शाळांवर ६२ शिक्षक कार्यरत आहेत. राज्यव्यापी संपात सहभागी होण्यासाठी यातील ५० शिक्षक सामूहिक रजेवर गेले. त्यामुळे १० शाळांचे अध्यापन दिवसभर सुरू राहिले व १० शाळा बंद होत्या. -देवेंद्र आहीरे, केंद्र प्रमुख, जानेफळ
घाटनांद्रा परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी मक्याच्या लागवडीसाठी टोकन यंत्राचा वापर करत नवा आदर्श निर्माण केला आहे. कमी वेळात जास्त क्षेत्रावर लागवड करता येत असल्याने आणि मजुरांची टंचाई भासत असल्याने या पद्धतीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यंदा परिसरात तब्बल ३०० एकरवर मका लागवड होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. टोकन यंत्राद्वारे मका पेरणी केल्यास दोन ते तीन तासांत संपूर्ण प्लॉट तयार होतो. मजूर मिळत नसल्याने होणारा विलंब टळतो. योग्य आर्द्रतेत वेळेत पेरणी करता येते. त्यामुळे पीक चांगले येण्याची शक्यता वाढते. घाटनांद्रासह चारणेर, धारला वाडी, पेंडगाव परिसरात या तंत्राचा झपाट्याने प्रसार झाला आहे. काही शेतकऱ्यांनी स्वतःचे टोकन यंत्र घेतले. काहींनी भाड्याने यंत्र घेऊन लागवड केली. कृषी अधिकाऱ्यांनीही या तंत्राचे कौतुक केले. टोकन पद्धतीमुळे बियाण्याचा योग्य वापर होतो. समसमान अंतर राखले जाते. अंकुरणाचा टक्का वाढतो. त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. हवामानही मक्यासाठी अनुकूल आहे. त्यामुळे यंदा विक्रमी उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेतकरी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असून कृषी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे चित्र घाटनांद्रा परिसरात दिसून येत आहे. यंदा जोरदार पाऊस झाल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी चांगली आहे. त्यामुळे यंदा जास्तीचे शेतकरी सध्या रब्बी पिकांची पेरणी करतानाही दिसून येत आहेत. अनेक शेतकऱ्यांची कामे सोबतच आल्यामुळे मजूर वर्गही लवकर मिळत नाही. यामुळे अनेक शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत. शेतीमध्ये जास्तीत- जास्त यंत्राचा उपयोग करण्यावर भर देताना दिसून येत आहेत. उत्पादनात नक्की वाढ ः शेतकरी आकाश मोरे म्हणाले, मका लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना टोकन यंत्र फारच उपयोगी पडत आहे. कमीत कमी मजूर, कमी वेळ आणि बियाण्यांचा योग्य वापर यामुळे उत्पन्नात हमखास वाढ होते. शिवाय मजुराचाही खर्च वाचतो. मी टोकनच्या सहाय्याने अवघ्या दोन तासांत तीन एकर मकाची लागवड केली. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता या पिकात तरी चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा परिसरातील शेतकऱ्यांना आहे, अशी माहिती शेतकऱ्यांमधून दिली जात आहे. सध्या घाटनांद्रा परिसरामध्ये मका लागवडीला मोठ्या प्रमाणात वेग आल्याचे दिसून येत आहे.
बालविवाह रोखण्यासाठी दावरवाडीत जनजागृती मोहीम:प्रतिबंधासाठी उपस्थितांनी घेतली सामूहिक शपथ
आशिष ग्राम रचना ट्रस्ट, पाचोड आणि ग्रुप ग्रामपंचायत दावरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रतिबंध जनजागृती अभियान घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे कार्यक्रमाला सुरुवात झाली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमात अल्पवयीन मुलींचे लग्न टाळण्याचे आवाहन करण्यात आले. शासनाने यासाठी कडक कायदे केले आहेत. लहान वयात लग्न म्हणजे गरिबीला आमंत्रण असल्याचे सांगण्यात आले. बालविवाहाचे धोके, दुष्परिणाम आणि नागरिकांची भूमिका यावर मार्गदर्शन झाले. माहितीपूर्ण सादरीकरण आणि संवादाद्वारे उपस्थितांना जागरूक करण्यात आले. सरपंच ॲड. डी.डी. जाधव आणि पोलिस पाटील एकनाथ काशीद यांनी बालविवाहासारख्या सामाजिक समस्येवर प्रभावी मार्गदर्शन केले. नागरिकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला उपसरपंच प्रशांत देशमुख, सचिन मगरे, साहेबराव धारे उपस्थित होते. किशोर शिंदे, संजय मांडे आणि गोरख राठोड यांनी मार्गदर्शन केले. शेवटी बालविवाह प्रतिबंधासाठी सामूहिक शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.
ढवळापुरी शिवारामध्ये बिबट्याची दहशत:15 दिवसांत 6 जनावरे फस्त
परिसरातील ढवळापुरी शिवारात बिबट्याने गेल्या पंधरा दिवसांपासून मोठी दहशत निर्माण केली आहे. या काळात बिबट्याने जवळपास ८ ठिकाणी हल्ले करून शेतकऱ्यांची ६ जनावरे फस्त केली आहेत. बिबट्याच्या या वाढत्या आणि हिंस्त्र वावरामुळे स्थानिक शेतकरी तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री बिबट्याने ढवळापुरी येथील शेतकरी पांडुरंग हिंमत पुंगळे यांच्या गट नंबर १५ मधील गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर पुन्हा हल्ला केला. या हल्ल्यात एका बकरीचा जागीच फडशा पडला, एक बकरी जखमी झाली, तर बिबट्या दोन बकऱ्यांना घेऊन पसार झाला. तर गुरुवारी सकाळी शेतात गेल्यावर ही घटना लक्षात आल्यानंतर पुंगळे यांनी गावकऱ्यांना आणि वन विभागाला तातडीने माहिती दिली. ढवळापुरी, वाहेगाव आणि गोलटगाव या शिवारांमध्ये बिबट्याचे दर्शन झाले आहे. गोलटगाव परिसरात बिबट्या नसून तरस असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले असले, तरी बिबट्याची मुख्य उपस्थिती या भागात कायम आहे. शेतकरी शरद पुंगळे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, गेल्या पंधरा दिवसांत ७ ते ८ ठिकाणी झालेल्या हल्ल्यांची माहिती वन विभाग आणि करमाड पोलिसांना देऊनही बिबट्याचा बंदोबस्त होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पकडण्यासाठी पिंजरा लावला ^बिबट्याचे ठसे आढळले असून त्याला पकडण्यासाठी गोठ्याजवळ पिंजरा लावण्यात आला आहे. पिंजऱ्यात बकरी ठेवण्यात आली आहे. वन विभाग आणि रेस्क्यू टीमने शोधमोहीम सुरू केली असून, बिबट्याला लवकरच जेरबंद करण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. - सागर कुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, संभाजीनगर.
लाडसावंगी साबळे मळा परिसरात २००५ मध्ये बांधलेला केटीवेअर बंधारा आजही दरवाजेविना आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करूनही पाणी अडत नाही. शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पाण्याचा तुटवडा भेडसावत आहे. दरवाजे नसल्याने पावसाचे आणि नदीचे पाणी थेट वाहून जाते. या बंधाऱ्याचे काम २००५-०६ मध्ये करण्यात आले. मात्र २० वर्षांनंतरही लोखंडी दरवाजे बसवले गेलेले नाहीत. त्यामुळे बंधाऱ्याचा उपयोग होत नाही. शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकरी प्रकाश साबळे यांनी जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला. बंधारा आहे पण दरवाजे नाहीत, तर पाणी अडणार कसं?’ असा सवाल त्यांनी केला. अनेक वेळा चकरा मारूनही दरवाजे मिळालेले नाहीत. प्रशासनाकडून कोणतेही ठोस आश्वासनही मिळालेले नाही. शासन पाणी अडवा, पाणी जिरवा म्हणत आहे. पण दरवाजेविना बंधारे केवळ शोभेच्या वास्तू ठरत आहेत. २० वर्षांपूर्वीच्या बांधकामाचा शेतकऱ्यांना काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे खर्च वाया गेला, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. २० वर्षांपूर्वी काम झालं. पण दरवाजेच नाहीत. पाणी वाहून जातं. आम्ही तहानलेलेच आहोत. जिल्हा परिषदेनं तत्काळ दरवाजे बसवावेत. अन्यथा आंदोलन करू’, असा इशारा प्रकाश साबळे यांनी दिला. साबळे मळ्यातील बंधाऱ्याला तात्काळ दरवाजे बसवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कर्ज दरामध्ये कमी लाभ, ठेवीवर व्याज जास्त घटले:आतापर्यंत 1.25% कपात, आपला फायदा किती?
जनतेला दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) यावर्षी रेपो दरात एकूण १.२५% कपात केली आहे, परंतु कर्जांवर केवळ अर्धाच लाभ मिळाला. फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीतही रेपो दरात १% कपात केली होती. त्या तुलनेत बँकांनी त्यांचे कर्ज दर फक्त ०.५८% ने कमी केले. महागड्या ठेवी: बँकांचा युक्तिवाद असा की, ते ठेवींवर, कर्जासाठी उभारलेल्या निधीवर जास्त व्याज देत असल्याने आरबीआयच्या कपातीनंतरही ते कर्जदारांना पूर्ण फायदा देऊ शकत नाहीत. तथापि, या कालावधीत बँकांनी फेब्रुवारी ते ऑक्टोबर या कालावधीत त्यांचे ठेवी दर १.०६% ने कमी केले. सरकारने १०% नाममात्र जीडीपवर आधारित तूट लक्ष्य ठेवले होते. दुसऱ्या तिमाहीत ते ८.७% साध्य झाले. रेपो दरात ०.२५% कपात, ही चौथी वेळ मुंबई |रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो दर ०.२५% ने कमी करून ५.२५% केला. जूननंतरची ही पहिलीच कपात आहे. या वर्षी फेब्रुवारीपासून आरबीआयने चार टप्प्यांत एकूण १.२५% व्याजदरात कपात केली आहे. पॉलिसी दर कपात सुरू होण्यापूर्वी रेपो दर ६.५०% होता. या ताज्या कपातीमुळे गृह, वाहन आणि इतर कर्जे स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. आरबीआय बँकांत १.४५ लाख कोटींची अतिरिक्त रोकड टाकणार आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत वाढती अनिश्चितता देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका वाढवत आहे असे रिझर्व्ह बँकेचे मत आहे. तथापि, महागाई कमी राहील असा केंद्रीय बँकेला विश्वास आहे. परिणामी, फेब्रुवारी २०२६ मध्ये रेपो दर ०.२५% ने कमी करून ५% केला जाईल असे दिसते. यामुळे धोरणात्मक दर कपातीचा सध्याचा टप्पा संपेल. अमेरिकी करांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मागणी निर्माण करणे आवश्यक आहे. जीएसटी दर कपात यशस्वीरित्या तिसऱ्या तिमाहीत मागणी राखण्यास मदत झाली. चौथ्या तिमाहीत बँका महत्त्वाची भूमिका बजावतील.
नाशिकच्या तपोवनात वृक्षतोड नाही:एक्झिबिशन सेंटरची निविदाही रद्द करू- महाजन
तपोवनातील वृक्षतोड प्रकरणात पर्यावरणप्रेमी आणि संघटना आक्रमक झाल्यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी तपोवनातील मोठी झाडे तोडली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. नाशिककरांची भावना तीच आमची भावना असल्याचे सांगत एक्झिबिशन सेंटरची निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही झाडांच्या बदल्यात मोठी झाडे लावणार आहोत. तज्ज्ञांना घेऊनच सर्व काम होईल, एकही मोठे झाड आम्ही तोडणार नाही. छोटी झाडे उचलून दुसरीकडे लावू. ७०० झाडे हलवली जातील, पण १५ हजार नवीन झाडे लावली जातील. ही सर्व झाडे देशी प्रजातीची असून राजमुद्रा येथून १५ फूट उंच झाडे मागवली जाणार आहेत. सीएसआर निधीतून उद्योगपतींच्या मदतीने हा उपक्रम राबवण्याचे नियोजन असून एका झाडामागे जवळपास १४०० रुपये खर्च येणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला कोंडीत पकडण्याचा डाव नगर परिषद निवडणुकांपासून महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता शिंदेसेनेने जाहीर विरोध दाखवला असून वृक्षतोडीविरोधात आंदोलन केले आहे. दोन दिवसांपूर्वीच अजित पवारांनीही पर्यावरण जपणे महत्त्वाचे असे सांगून वृक्षतोडीला विरोध असल्याची भूमिका जाहीर केली. एकूणच राज्यात भाजपसोबत सत्तेत असणाऱ्या शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाने आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करण्याची सक्ती आणि शिक्षण विभागाचा १५ मार्च २०२४ चा वादग्रस्त संचमान्यतेचा शासन निर्णय याविरोधात राज्यातील शिक्षकांनी शुक्रवारी शाळा बंद आंदोलन पुकारले. खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या निर्णयाचा तीव्र निषेध केला. मुंबईसह पुणे, मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अमरावती, अहिल्यानगर आदी ठिकाणी शिक्षकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शिक्षण विभागाने टीईटी सक्ती रद्द करण्याबाबत आणि अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेवरील अन्यायकारक १५ मार्च २०२४ चा जीआर रद्द करण्याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास,नागपूर हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५३ वर्षांखालील सर्व शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य केली आहे. त्यामुळे सध्या हजारो शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. तसेच, शैक्षणिक वर्षाच्या मध्यात अतिरिक्त शिक्षक समायोजन सुरू केल्याने शाळांचे नियोजन कोलमडत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. टीईटी परीक्षेच्या विरोधात संपूर्ण राज्यभर शिक्षक रस्त्यावर उतरले. या आंदोलनाची धग राजधानी मुंबईतही जाणवली. काय आहेत मागण्या टीईटी उत्तीर्ण होण्याची अट रद्द करणे, १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करावा, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षक सेवक पद रद्द करून शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक हवी. मराठवाड्यातही आंदोलन मुख्याध्यापक संघ महाराष्ट्र राज्य आणि शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने शुक्रवारी मराठवाड्यात आंदोनलन केले. लातूर, हिंगोली,परभणी नांदेडमध्ये शिक्षकांनी आंदोलन करून घोषणाबाजी केली. लाखो शिक्षकांच्या नोकऱ्या संपुष्टात येतील : कपिल पाटील शिक्षक भारतीचे माजी आमदार कपिल पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. पाटील म्हणाले, राज्यातील तब्बल २५ हजार शाळा संपावर होत्या. “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला सरकार जबाबदार आहे. पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय राबवल्यास देशातील लाखो शिक्षकांच्या नोकऱ्या संपुष्टात येतील. सरकारने तातडीने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी. अन्यथा जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकतील, असा इशाराही त्यांनी दिला.पुण्यातील शिक्षकांनी शुक्रवारी आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीची करू नये, अशी मागणीही या वेळी केली.
शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशीसाठी समितीकडून चौकशी केली जात आहे. त्यासाठी ६० दिवसांची मुदत दिल्याचे सांगितले गेले. पण प्रत्यक्षात कालावधीबाबत काहीच नमूद नसल्याचे उघड झाले असून त्यामुळे तपास रखडण्याचीच चिन्हे दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात व्यवहाराची कागदपत्रे सादर करण्याचे पत्र पाठवले, पण ती अजून चौकशी समितीला मिळालेली नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने चौकशी समिती स्थापन केली होती. भाजपचा दबाव, दोन्ही राष्ट्रवादीत एकोपा १७ वर्षांतील शासनाने दिलेल्या अनुदानाच्या खर्चातून अनियमितता आढळल्यास संस्थेवर कारवाई होईल, अशी शक्यता अजूनही आहे. शरद पवारांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचेही काही नेते आहेत. गेल्या काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकोपा होत असल्याचे चित्र आहे, तर पार्थ पवारांकडून पुण्यातील जमीन खरेदी असो किंवा अजित पवारांची वक्तव्ये त्यांना भाजप पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हे चौकशीचे आदेश म्हणजे दबावाचे राजकारण असल्याचेच दिसत आहे.
‘आता या हत्तींचे करायचे काय?’:वन खात्याकडे रानटी हत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी ठोस योजनाच नाही!
कोकणातील सिंधुदुर्ग आणि पूर्व विदर्भातील गडचिरोलीत रानटी हत्तींचा कळप स्थिरावला आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तीबाधित क्षेत्राचा विषय चिघळला असून हत्तीपकड मोहिमेपर्यंत हा विषय आला आहे. मात्र, वन खात्याकडे रानटी हत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी ठोस योजनाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुधीर मुनगंटीवार वनमंत्री असताना कोलकात्याच्या सेज फाऊंडेशनसोबतचा होणारा सामंजस्य करारही थंड बस्त्यात गेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इतर उपाययोजनांसाठी मुख्य वनसंरक्षक (कोल्हापूर) यांना पाठवलेला ६५० कोटी रुपयांचा प्रस्तावही लालफितीमध्ये अडकून पडला आहे. तामिळनाडू आणि कर्नाटकनेही ओंकारसह महाराष्ट्रातील हत्ती स्वीकारण्यास नकार दिल्याने “आता या हत्तींचे करायचे काय?’ असा प्रश्न वन खात्यासमोर निर्माण झाला आहे. कोकणातील तसेच पूर्व विदर्भातील शेतकरी हे हत्तीकडून केल्या जाणाऱ्या पीक नुकसानीमुळे हवालदिल झाले आहे. काेकणात हत्ती हा प्रामुख्याने भात, केळी, नारळ, सुपारी, बांबू आणि काजू या पिकांचे तर पूर्व विदर्भात भात, कापूस, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतो. कर्नाटकातून पहिल्यांदा हत्ती दक्षिण महाराष्ट्रात उतरले. त्यानंतर कोकण आणि विदर्भातील गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात या रानटी हत्तींनी २०२२ मध्ये उच्छाद मांडला होता. या हत्तींची देखरेख, संवर्धन आणि व्यवस्थापनाचा कृती आराखडा करण्यासाठी कोलकाता येथील स्ट्राइप्स अँड ग्रीन अर्थ फाउंडेशनने २०२३ मध्ये सामंजस्य कराराचा प्रस्ताव सादर केला होता. यापूर्वी गवे, रानडुक्कर, वनगायीसारख्या वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेतजमिनीतील पिकांचे नुकसान होते होते. त्यात आता रानटी हत्तींची भर पडली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बोलताना तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हालचाली सुरू झाल्या होत्या. सागनिक सेनगुप्ता आणि सीमा सेनगुप्ता या निसर्गप्रेमी दाम्पत्याने स्ट्रिपेप्स अँड ग्रीन अर्थ फाउंडेशन सुरू केले. हत्तींची देखरेख, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी हे फाउंडेशन कार्यशाळा घेऊन वनकर्मचाऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थांना प्रशिक्षण देते. ‘ओंकार’ साठी प्रतिज्ञापत्र दाखल करा वन्यजीवप्रेमी रोहित कांबळे यांनी ओंकार हत्तीला वनतारामध्ये धाडण्याच्या निर्णयाविरोधात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. “ओंकार’ ला हत्तीला गुजरातमधील वनतारा सेंटरमध्ये पाठवण्यासंदर्भातील याचिकेवर ७ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचसमोर सुनावणी पार पडली. तेव्हा प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले. पूर्वसूचना देणारी यंत्रणा लावणे आवश्यक प्रशासनाने हत्ती लोकवस्तीनजीक येण्यापूर्वी पूर्वसूचना देणारी यंत्रणा लावणे आवश्यक आहे. ‘हत्ती व्यवस्थापन प्रणाली’ ही पूर्वसूचना प्रणाली भारतात अनेक ठिकाणी विकसित केली आहे. ही प्रणाली स्थानिकांना हत्तीच्या वावरासंदर्भात पूर्वसूचना देते. बीएनएचएसतर्फे यासाठी वन विभागास मदत केली जाईल - किशोर रिठे, संचालक, बीएनएचएस आजवर केलेले सर्व परंपरागत प्रयत्न फसले फटाके, ढोल, ताशे आदींच्या आवाजाने त्यांना हुसकावण्याच्या ‘गो बॅक एलिफंट’ मोहिमा कधीच फसल्या आहेत. मोठ्या वाहनांच्या हेडलाइटचा झोतही वापरला. आफ्रिकन जंगल परिसरातील हत्तींचा अभ्यास केलेल्या डॉ. रुद्रादित्य यांनी शेतकऱ्यांमध्ये जाऊन ‘चिलीस्मोक’च्या (मिरची धुराचा ठसका) माध्यमातून हत्तींना पळवण्याची प्रात्यक्षिके हत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी घेतली. सिंधुदुर्गात पाच हत्तींचा वावर २००२ साली प्रथम ७ हत्तींचा कळप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात दाखल झाला. २००४ साली आठ हत्तींनी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केला. २००४ मध्ये दोडामार्ग तालुक्यात आलेल्या २५ पैकी १६ हत्तींना मागे पिटाळून लावण्यात वन विभागाला यश आले. २००५ सालापासून रानटी हत्ती सिंधुदुर्गवासी झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २००९ साली एकूण १७ हत्ती असल्याचे सांगितले जाते. सध्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात आठ रानटी हत्तींचा वावर आहे. यामधील दोडामार्ग तालुक्यात गणेश नावाचा टस्कर त्याच्यासोबत माई नावाची मोठी मादी, लहान मादी आणि दोन पिल्ले अशा एकूण पाच हत्तींचा वावर आहे.
देशात महाराष्ट्र राज्य सौरऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठीचे फीडर सौरऊर्जेवर आणून स्वतंत्रपणे १६ हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची योजना आहे. ती पूर्ण झाल्यावर म्हणजे पुढील वर्षात उद्योगांसह अन्य वापराच्या वीज दरात दरवर्षी ३ टक्के स्वस्त वीज देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. ते ऑरिक सिटी येथे ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत विश्वविक्रम केल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात बोलत होते. महावितरणने नोव्हेंबर या एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप बसवून उच्चांक गाठला.त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली. गिनीजतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा शुक्रवारी ऑरिक सिटी मैदानावर झाला. या वेळी गिनीजचे कार्ल सॅबेले, मंत्री अतुल सावे, मेघना साकोरे-बोर्डीकर व स्थानिक आमदार उपस्थित होते. सौरऊर्जा वाढल्याने वीज होऊ शकते स्वस्त सद्य:स्थितीत तीन हजार मेगावॅट वीज उत्पादन होते. डिसेंबर २०२६ पर्यंतचे १६ हजार मेगावॅटचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्याला महावितरण ८ रुपयांनी विकत घेतलेली वीज दीड रुपयात देत होते. हा साडेसहा रुपयांचा तोटा उद्योगांकडून वसूल केला जात होता. नवीन सौर निर्मितीमुळे याची गरज पडणार नाही. उद्योगांना दिलासा मिळून विजेचे दर कमी होतील.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ यांच्या अमेडिया कंपनीला पॅरामाउंट एंटरप्रायझेस कंपनीच्या संचालक शीतल तेजवानीने १८०० कोटींची जमीन ३०० कोटी रुपयांत विकली. हा घोटाळा उघडकीस आल्यावर २६ दिवसांनी ४ डिसेंबर रोजी अटक झाली. तिच्यावर २०१५ पासून आतापर्यंत मागील दहा वर्षात आर्थिक फसवणुकीचे नऊ गुन्हे विविध पोलिस ठाण्यांत दाखल आहेत. त्यातील बहुतांश गुन्हे पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात दाखल आहेत. पण आतापर्यंत तिला अटक न करताच तपास झाला. गुन्हा करून अटकपूर्व जामीन मिळवत पुढील गुन्हे करण्यासाठी तिला मोकळीक देण्यामागे नेमका मास्टरमाइंड कोण आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तिच्या घराची पोलिसांनी झडती घेऊन काही कागदपत्रे जप्त केली. दरम्यान, पार्थ पवारवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. शीतलच्या पतीचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तिच्या विरोधात २०१५ मध्ये हिंजवडी व शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. २०१९ मध्ये पिंपरी पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल झाले. २०२१ मध्ये पुन्हा पिंपरी आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालय आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल झाला. २०२५ मध्ये बावधन पोलिस ठाण्यात फसवणुक गुन्हा दाखल झाला. परंतु तिला अटक झाली नाही. तेजवानीच्या घरी छापेमारी पुणे पोलिस आर्थिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी एकाचवेळी शुक्रवारी शीतल तेजवानीच्या पिंपरीतील माहेरच्या घरी आणि कोरेगावपार्क येथील निवासस्थानी छापे टाकले. महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले.
2 ग्रीनफील्ड रस्त्यांनी शेंद्रा-बिडकीन जोडणार:744 कोटी निधी मंजूर, किमान 5 वर्षे लागू शकतात
सार्वजनिक बांधकाम विभागाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला गती देत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी दोन नवीन ग्रीनफील्ड रस्त्यांकरिता ७४४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. हे दोन्ही रस्ते औद्योगिक क्षेत्राला राष्ट्रीय महामार्ग आणि महत्त्वाच्या शहरांशी जोडणारे आहेत. हे रस्ते वाहतुकीला उपलब्ध होण्यास किमान ५ वर्षे लागू शकतात. हे ७४४ कोटी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (एआयआयबी), न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून (एनडीबी) कर्जावर मिळणार आहेत. कशामुळे दिली मान्यता छत्रपती संभाजीनगरजवळ ३२४५ एकरमध्ये वाळूज व २२५५ एकरमध्ये शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहती आहेत. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पात १०,००० एकरवर नवीन स्मार्ट औद्योगिक शहर वसवले जात आहे. बिडकीन येथे टोयोटा, जेएसडब्ल्यू, एथर यासारख्या मोठ्या कंपन्यांचे उत्पादन युनिट्स कार्यरत होत आहेत. म्हणून वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. ग्रीनफील्ड रस्ता म्हणजे काय? ग्रीनफील्ड रस्ता पूर्णपणे नवीन, विकसित नसलेल्या वा कमी विकसित जमिनीवरून (उदा. शेतजमीन, मोकळी जागा) बांधला जातो. तो जुन्या, अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे विस्तारीकरण वा सुधारणा केलेला नसतो. असे असतील ग्रीनफील्ड रस्ते 1 रस्ता : संभाजीनगर -जालना डीएमआयसी, करमाड ते बिडकीन सहापदरी.लांबी : अंदाजे ३२ किमीखर्च : भूसंपादनासह ३१५ कोटी रुपये. 2 रस्ता : बिडकीन-ढोरेगाव (पुणे-अहिल्यानगर रस्ता) सहापदरी.लांबी : अंदाजे ३५.८० किमीखर्च: भूसंपादनासह ४३० कोटी रुपये. पुढील २५ वर्षांसाठी आवश्यक- उत्सव माछर, अध्यक्ष, सीएमआयए हा पुढील २५ वर्षांच्या औद्योगिक प्रगतीवर परिणाम करणारा निर्णय आहे. शेंद्रा-बिडकीन येथे पुढील काळात इलेक्ट्रिक व्हेइकलसह अनेक मोठ्या कंपन्या येणार आहेत. या कंपन्यांत कच्चा माल घेऊन येणारे आणि उत्पादन इतर शहरांत घेऊन जाणारे ट्रक छत्रपती संभाजीनगर शहराबाहेरूनच जावेत यासाठी हे रस्ते अत्यंत उपयुक्त ठरतील. दोन्ही रस्ते सहापदरी होतील, हे महत्त्वाचे. यामुळे वेळेची, इंधनाची मोठी बचत होईल. एकूणच औद्योगिक विकासाला गती मिळेल.
जळकोट तालुक्यातील जि. प. शाळांना कुलूप
जळकोट : प्रतिनिधी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना टीईटी पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आल्यामुळे देशभरासह राज्यातील लाखो शिक्षकांच्या नोकरीवर संकट निर्माण झाले आहे. दोन वर्षात जर टीईटी परीक्षा पास नाही झाली तर शिक्षकांना नोकरी सोडावी लागणार आहे, या निर्णयाविरोधात तसेच अनेक अशैक्षणिक कामाविरोधात राज्यभरातील हजारो शिक्षकांनी सामूहिक रजा आंदोलनात सहभाग नोंदवला. याचा फटका जळकोट तालुक्यातील विद्यार्थ्यांनाही बसला […] The post जळकोट तालुक्यातील जि. प. शाळांना कुलूप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उठाबशांमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू प्रकरण:तीन शिक्षण अधिकारी निलंबित, शिक्षण विभागाची मोठी कारवाई
पालघर जिल्ह्यातील वसई येथील सातीवली येथील श्री हनुमान विद्या मंदिर शाळेत एका शिक्षिकेने शिक्षा म्हणून दिलेल्या उठाबशांमुळे विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी संबंधित तीन शिक्षण अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची कारवाई केली आहे. पालघर जिल्ह्यातील सातीवली येथील श्री हनुमान विद्या मंदिर शाळेत एका शिक्षिकेने विद्यार्थिनी काजल उर्फ अंशिका गौड हिला शिक्षा म्हणून उठाबशा काढायला लावल्या होत्या. या शिक्षेनंतर अंशिकाची प्रकृती बिघडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गंभीर आणि संतापजनक घटनेमुळे पालक आणि नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी तीन शिक्षण अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या अधिकाऱ्यांवर, घटनेची माहिती वरिष्ठांना न देणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे अक्षम्य दुर्लक्ष करणे आणि अनधिकृत शाळांवर वेळेत कारवाई न करणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये वसई प्रभारी गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे, वसई पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र उबाळे, आणि वालीव केंद्रप्रमुख कैलास चव्हाण यांचा समावेश आहे. वसईतील सातीवली परिसरात अनधिकृतपणे वर्ग चालत असल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या, तरीही शिक्षण विभागाने त्यावर कोणतीही योग्य कारवाई केली नव्हती, ज्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि वेळेत माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. अशा निष्काळजीपणाला कोणतीही मुभा दिली जाणार नाही, हेच या कारवाईतून प्रशासनाने दाखवून दिले आहे. उशीर झाल्याने 100 उठाबशांची शिक्षा वसई पश्चिममधील सातीवली परिसरातील श्री हनुमंत विद्या हायस्कूलमध्ये ही संतापजनक घटना घडली. विद्यार्थिनी शाळेत पोहोचण्यासाठी अवघी दहा मिनिटे उशिरा आल्याचा राग एका शिक्षिकेला अनावर झाला. या रागातून शिक्षिकेने त्या विद्यार्थिनीला 100 उठाबशा काढण्याची भयावह शिक्षा ठोठावली. जीवापेक्षा मोठ्या असलेल्या या शिक्षेमुळे विद्यार्थिनीची तब्येत गंभीररीत्या बिघडली आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलीच्या पालकांनी तीव्र संताप व्यक्त करत, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी तातडीने शाळेत व रुग्णालयात जाऊन चौकशी केली, परंतु शनिवार असल्याने शाळेत कोणतेही रेकॉर्ड किंवा माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेत शिक्षण विभागाने आता मोठी कारवाई केली आहे.
पुणे पुस्तक महोत्सवासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य मांडव उभारणीचे काम वेगात सुरू आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत आयोजित या महोत्सवात आठशेहून अधिक नामांकित प्रकाशकांचे स्टॉल, बालगोपाळांसाठी 'चिल्ड्रेन कॉर्नर', साहित्यिक कार्यक्रमांसाठी व्यासपीठ, आकर्षक प्रवेशद्वार आणि 'फूड कोर्ट' यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. हा पुणे पुस्तक महोत्सवाचा तिसरा वर्धापनदिन आहे. देशभरातील साहित्यप्रेमींसाठी हा महोत्सव महत्त्वाचा ठरला आहे. आतापर्यंत आठशेहून अधिक स्टॉलचे बुकिंग झाले असून, १२ डिसेंबर रोजी संगणकाधारित लॉटरी पद्धतीने प्रकाशकांना स्टॉलचे वाटप केले जाईल. वाचकांच्या सोयीसाठी स्टॉलचे कलर कोडिंग करून प्रवेशद्वारावर माहिती दिली जाईल. मांडवात इंटरनेट-वायफाय, आसनव्यवस्था, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पुस्तकांच्या प्रकाशनासाठी तसेच लेखक-वाचक संवादासाठी विशेष जागा उपलब्ध असतील. पुण्याच्या वाचन संस्कृतीचे प्रतीक असलेले शनिवार वाड्याचे प्रवेशद्वार आणि पुस्तकरुपी बुरुज या महोत्सवाचे बोधचिन्ह भव्य प्रवेशद्वाराच्या स्वरूपात साकारले जात आहे. बालगोपाळांचा सहभाग वाढवण्यासाठी 'चिल्ड्रेन कॉर्नर'मध्ये चित्रकला, शिल्पकला, लेखन-अभिनय यांसारख्या कला-साहित्य-संस्कृती-अध्ययनाच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातील. 'पुणे लिट फेस्ट' यंदा अॅम्फी थिएटरमध्ये सहा दिवस साहित्यप्रेमींना अनुभवता येणार आहे. 'फूड कोर्ट'मध्ये वीसहून अधिक खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि 'लाइव्ह म्युझिक'ची सोय असेल. वाचकांच्या वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पुणे पुस्तक महोत्सव संयोजन समितीने नुकतीच सहभागी प्रकाशकांची बैठक घेतली. महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी प्रकाशकांना व्यावसायिक सहभागासोबतच सामाजिक भान जपण्याचे आवाहन केले. 'एनबीटी'चे अध्यक्ष मिलिंद मराठे, संयोजिका बागेश्री मंठाळकर आणि ज्येष्ठ पत्रकार अभय कुलकर्णी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवात अनेक नवीन पुस्तके आणि ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
मुंबई : प्रतिनिधी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज रेपो दरात ०.२५ टक्के कपात जाहीर केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण विषयक समितीच्या बैठकीनंतर रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंटची कपात करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. यामुळे रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर आला आहे. या निर्णयामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या ईएमआयचा भार कमी होणार आहे. […] The post रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के कपात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कोणत्याही दबावाशिवाय भारताला तेलसाठे निर्यात करत राहणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली. सुरक्षा, अर्थव्यवस्था, व्यापार आणि संस्कृती या क्षेत्रात आमचे संबंध सतत मजबूत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असेही ते म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद मानवतेच्या मूल्यांवर हल्ला आहे. याविरुद्ध भारत-रशिया एकत्रितपणे […] The post इंधन पुरवठा सुरूच राहणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे : प्रतिनिधी मुंढवा जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या शितल तेजवानीच्या पिंपरीतील माहेरच्या घरी आज पुणे पोलिस पोहोचले आणि माहेरच्या घराची आज झाडाझडती घेतली. जमीन व्यवहारासंबंधीच्या कागदपत्रांचा पोलिस शोध घेत आहेत. त्यासाठीच ही झाडाझडती घेण्यात आली. मूळ कुलमुखत्यारपत्र, मूळ दस्त, तसेच ३०० कोटींपैकी काही रक्कम हस्तगत करायची आहे. त्या अनुषंगाने पुणे पोलिस पिंपरीच्या घरी […] The post तेजवानीच्या घराची झाडाझडती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गेल्या वर्षी 5 डिसेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील शानदार विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि आज महायुती सरकारच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीमुळे भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सपकाळ यांनी भाजपला डिवचताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, असा टोला लगावला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका करताना म्हटले की, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. कोणासोबत युती करायची ते अमित शहा ठरवतात, पालक मंत्री कोण याचा सुद्धा निर्णय ते घेतात. देवेंद्र फडणवीस हे नामधारी मुख्यमंत्री आहेत. या सरकारने वर्षपूर्तीमध्ये काहीही केले नाही. पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राज्यात गुन्हेगारी वाढत आहे, त्यावर मंत्र्यांचे उत्तर हास्यास्पद असते. महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सगळ्यात लाचार सरकार आहे. महाराष्ट्रात टोळी युद्ध सुरू आहे. पुढच्या वर्षात तरी त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावी अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र दिवाळखोरीला लागले आहे, त्यामुळे केंद्र सरकार कडून त्यांनी निधी आणावा. औरंगजेब जसा क्रूर कर्मा होता तशी स्थिती दिसते. पुढच्या कालावधीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. वैयक्तिक शुभेच्छा नाहीत, लोकांच्या हितासाठी शुभेच्छा आहेत. या वेळी कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार देखील उपस्थित होते. ते म्हणाले, वर्षपूर्तीच्या निमित्ताने अनेक प्रश्न समोर येत आहेत. लाडक्या बहिणींपासून लाडक्या कंत्राटदार पर्यंत पोहचले आहेत. अनेक कंत्राटदारांना कोट्यवधींची कामे देत खैरात वाटली. महाराष्टात यांनी कोणते दिवे लावले, शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना मदती संदर्भात प्रस्ताव आला नाही असे केंद्रीय मंत्री सांगतात. मग कोण खोटं बोलत आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
स्टेट डिनर कार्यक्रमात पुन्हा राहुल गांधी-खरगेंना डावलले
नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दोन दिवसांच्या भारत दौ-याचा आज शेवटचा दिवस आहे. ते २३ व्या भारत-रशिया समिटमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीमध्ये आले असून, आज रात्री रशियाला रवाना होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी राष्ट्रपती भवनात त्यांच्या सन्मानार्थ स्टेट डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये सूर्त्यांच्या हवाल्याने दावा करण्यात आलाय की, या कार्यक्रमाला राजकारणासह […] The post स्टेट डिनर कार्यक्रमात पुन्हा राहुल गांधी-खरगेंना डावलले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कर्नाटकात मासिक पाळीची सशुल्क रजा मंजूर
बंगळूरू : कर्नाटक सरकारने सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला कर्मचा-यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. १८ ते ५२ वयोगटातील सरकारी महिला कर्मचा-यांसाठी आता महिन्याला एक दिवस सशुल्क मासिक पाळीची रजा मंजूर करण्यात आली आहे. हा आदेश तात्काळ लागू करण्यात आला आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी महिला कर्मचा-यांच्या कामाच्या ठिकाणी मोठे बदल […] The post कर्नाटकात मासिक पाळीची सशुल्क रजा मंजूर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धुम्रपानावरील कराचा पैसा संकटकाळी वापरला जाणार
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक, २०२५ सादर करून एक महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा केली आहे. या विधेयकाचा उद्देश देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि सार्वजनिक आरोग्याच्या खर्चासाठी कायमस्वरूपी निधीचा स्रोत उपलब्ध करणे आहे. या विधेयकानुसार, हा नवीन उपकर केवळ पान मसाला, गुटखा आणि अधिसूचित केलेल्या इतर हानिकारक […] The post धुम्रपानावरील कराचा पैसा संकटकाळी वापरला जाणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इंडिगो एअरलाईनच्या ऑपरेशनल समस्यांमुळे कालपासून पुणे, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली या प्रमुख विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. इंडिगो विमानाचे बुकिंग असलेल्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसला असून, मोठ्या प्रमाणात विमाने रद्द झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल चिंता व्यक्त करत, या इंडिगो प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. मुरलीधर मोहोळ म्हणाले, DGCA च्या FDTL आदेशांना तत्काळ स्थगिती देण्यात आली असून, प्रवासी हित लक्षात घेऊन आणि विमान सुरक्षेत कोणतीही तडजोड न करता हे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रालयात 247 नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून तेथून परिस्थितीवर देखरेख ठेवली जात आहे. केंद्र सरकारने या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार ही परिस्थिती पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत आहे. आम्हाला विश्वास आहे की पुढील एक-दोन दिवसांत विमानसेवा स्थिर होतील आणि तीन दिवसांत पूर्णपणे सामान्य होतील, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला आहे. इंडिगो एअरलाईनच्या ऑपरेशनल समस्यांमुळे विस्कळीत झालेले विमान उड्डाणांचे वेळापत्रक आज मध्यरात्रीपर्यंत स्थिर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, पुढील काही दिवसांत संपूर्ण सेवा पूर्ववत होऊन विमान वाहतुकीमध्ये स्थिरता येईल. प्रवाशांना घरी बसूनही विमानांच्या विलंबाची माहिती मिळवता यावी यासाठी इंडिगो आणि इतर कंपन्यांनी विकसित केलेल्या माहिती प्रणालीचा उपयोग करता येणार आहे. उड्डाण रद्द झाल्यास, इंडिगो तिकिटांसाठी प्रवाशांना स्वयंचलितपणे पूर्ण परतफेड सुनिश्चित करेल. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ज्या प्रवाशांचे विमान रद्द झाल्यामुळे ते विमानतळावर अडकले असतील, त्यांची निवासाची व्यवस्था विमान कंपन्यांनी बुक केलेल्या हॉटेलमध्ये केली जाईल. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी आरामखुर्ची सारख्या विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उशिरा उड्डाण करणाऱ्या प्रवाशांना अल्पोपहार आणि इतर आवश्यक गोष्टी पुरवल्या जातील. दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा 24/7 नियंत्रण कक्ष या संपूर्ण परिस्थितीवर सतत प्रत्यक्ष वेळेवर लक्ष ठेवून आहे.
न्यायिक प्रक्रियेवर एआयचे वर्चस्व नको
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी न्यायिक प्रणालीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि मशीन लर्निंगच्या अनियंत्रित वापरास प्रतिबंध घालण्याची मागणी करणा-या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटले की, त्यांना न्यायव्यवस्थेतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स(एआय) आणि मशीन लर्निंग(एमएल) साधनांच्या दुष्परिणामांची जाणीव आहे, परंतु हे मुद्दे न्यायिक निर्देशांऐवजी प्रशासकीय बाजूने योग्यरित्या सोडवले जाऊ शकतात. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत […] The post न्यायिक प्रक्रियेवर एआयचे वर्चस्व नको appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमेरिकेच्या विरोधात असाल तर व्हिसा रद्द
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा नियमांमध्ये कठोरता आणण्याचे आदेश दिले आहेत. एच-१बी अर्जदारांना त्यांचे सोशल मीडिया खाते सार्वजनिक करावे लागेल, जेणेकरून अमेरिकन अधिकारी अर्जदाराचे प्रोफाइल, सोशल मीडिया पोस्ट आणि लाइक्स पाहू शकतील. जर अर्जदाराची कोणतीही सोशल मीडिया अॅक्टिव्हिटी अमेरिकेच्या हिताच्या विरोधात दिसली, तर एच-१बी व्हिसा जारी केला जाणार नाही. एच-१बीच्या […] The post अमेरिकेच्या विरोधात असाल तर व्हिसा रद्द appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जगभरातील लाखो वेबसाइट्स पडल्या बंद
नवी दिल्ली : जगभरातील इंटरनेट युजर्स आज अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्रस्त आहेत. अनेक नामांकित वेबसाइट्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स एकाच वेळी बंद पडल्या असून या मोठ्या आउटेजसाठी कंटेंट सर्व्हिस प्रोव्हायडर क्लाऊड फेअर जबाबदार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कॅन्हा आणि डॉन डिटेक्टरसह अनेक मोठ्या सेवांवर या आउटेजचा परिणाम झाला आहे. अचानक वेबसाइट्स न चालल्याने […] The post जगभरातील लाखो वेबसाइट्स पडल्या बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
असिम मुनीर बनले पाकचे पहिले ‘सीडीएफ’
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने अखेर फिल्ड मार्शल असीम मुनीर यांना पाकिस्तानचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस अर्थात सीडीएफ नियुक्त केले आहे. आता मुनीर हे पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात शक्तीशाली लष्करी अधिकारी झाले आहेत. हे पद नुकतंच तयार करण्यात आले आहे. त्यामुळे अण्वस्त्रधारी पाकिस्तानच्या सर्व लष्कराची सूत्रे मुनीर यांच्या हातात एकवटली आहेत. ते आता तीनही […] The post असिम मुनीर बनले पाकचे पहिले ‘सीडीएफ’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) शालेय बस नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई केली आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत केलेल्या तपासणीत १ हजार ४६४ वाहनांपैकी २४९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून २२ लाख २२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक हा एक संवेदनशील विषय असून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तांनी, जे जिल्हा शालेय बस सुरक्षा समितीचे अध्यक्षही आहेत, त्यांनी वेळोवेळी शाळा आणि शालेय बस चालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे. ६ वर्षांखालील मुलांना ने-आण करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते. तसेच, पोलीस विभागामार्फत वाहनचालक, वाहक आणि मदतनीस यांची चारित्र्य पडताळणी करणे अनिवार्य आहे. सर्व शाळांमध्ये शालेय परिवहन समिती आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती स्थापन करण्याची जबाबदारी शालेय शिक्षण विभागाची आहे. या समित्यांनी शालेय बस चालकांच्या वार्षिक नेत्र तपासणी प्रमाणपत्राची पडताळणी करावी. प्रमाणपत्र नसलेल्या चालकांना शालेय विद्यार्थी वाहतूक करण्याची परवानगी दिली जाणार नाही. शालेय विद्यार्थ्यांवरील अनुचित प्रकार रोखण्यासाठी धोरण निश्चित करण्याकरिता २३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण आणि महिला बाल विकास विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालातील प्रकरण क्रमांक १० मध्ये विद्यार्थी वाहतुकीबाबत काही शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी बस आणि इतर वाहने मुलांसाठी सुरक्षित असल्याची खात्री शाळांनी करावी. प्रत्येक बस आणि इतर वाहनात सीसीटीव्ही असणे अनिवार्य आहे. ६ वर्षांखालील मुलांना ने-आण करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती आवश्यक आहे, तसेच मुलींच्या शाळांतील वाहनांमध्ये महिला कर्मचारी बंधनकारक आहेत. वाहनचालक, वाहक आणि क्लीनर यांची पोलीस पडताळणी होणेही आवश्यक आहे.
भोर तालुक्यातील निगुडघर मंडळाच्या मंडलाधिकारी रूपाली अरुण गायकवाड (वय ४०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. माती वाहतूक परवान्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. या प्रकरणी शुक्रवारी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. भोर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हा २३ वर्षीय व्यावसायिक असून, त्याने १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी भोर तहसीलदार कार्यालयातून २०० ब्रास माती वाहतुकीचा परवाना घेतला होता. यासाठी त्याने नियमानुसार १ लाख २६ हजार २३० रुपये रॉयल्टी सरकारकडे जमा केली होती. परवान्यानुसार माती वाहतूक सुरू असताना, ३० नोव्हेंबर रोजी मंडलाधिकारी गायकवाड यांनी तक्रारदाराच्या गाड्या अडवल्या. पुढील वाहतुकीसाठी त्यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली. पैसे न दिल्यास गाड्या सोडणार नाही, अशी धमकी देत त्यांनी गाड्या ताब्यात घेतल्या होत्या. पैसे न दिल्याने गाड्या अडवून ठेवल्याने आणि वारंवार कार्यालयात हजेरी लावण्यास सांगितले जात असल्याने तक्रारदार त्रस्त झाला होता. अखेर, त्याने ३ डिसेंबर रोजी पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर गायकवाड यांनी तक्रारदाराला भोर शहराबाहेरील अभिजीत मंगल कार्यालयाजवळ भेटण्यास बोलावून पुन्हा एक लाख रुपये देण्याची मागणी केली. एसीबीने सापळा रचला. ठरलेल्या वेळी भोरेश्वर नगर रस्त्यावर तक्रारदाराने लाचेची रक्कम दिल्यानंतर गायकवाड यांनी ती स्वीकारताच पंचांसमोर त्यांना अटक करण्यात आली. रासायनिक प्रक्रियेनंतर लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पाटील यांच्या पथकाने यशस्वी केली. या प्रकरणामुळे भोर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. माती वाहतूक परवान्यांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या घटना पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आल्या आहेत.
भाजप देवाभाऊमय आहे, तर महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊ ठरवतात, असे विधान मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेप घेतला आहे. मंगलप्रभात लोढा यांचे हे वैयक्तिक मत असू शकते. आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्याने चालतो. आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी 2022 ची देखील आठवण करून दिली. आमदार संजय गायकवाड म्हणाले, आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे. आम्ही जी क्रांती केली त्यामुळे भाजप आणि महायुती सरकारमध्ये आहे. त्यामुळे मंगलप्रभात लोढा यांचे ते वैयक्तिक मत असू शकते. परंतु, आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्याने चालतो, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. आता संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर लोढा काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. नेमके काय म्हणाले मंगलप्रभात लोढा? मुंबई भाजपचा एक मेळावा शुक्रवारी मुंबईत पार पडला. त्यात बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळत वरील विधान केले. यावेळी त्यांनी मुंबईत भाजपला महापौर झाल्यास आपली कॉलर टाईट होणार असल्याचाही दावा केला. मंत्री लोढा म्हणाले, आपण देवाभाऊंची वेगवेगळी रूपे पाहतोय. त्यांची 100 वेगवेगळी रूपे आहेत. त्यांनी मागील वर्षभरात अनेक कामे केली. ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले. भाजप देवाभाऊमय आहेच, पण महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देखील देवाभाऊच ठरवतात. मी मागील 25 वर्षांपासून त्यांना पाहतोय. त्यांना राजकारण करण्याचे काम कधी आवडते तर कधी आवडत नाही. पण आपल्या कुटुंबातील सुखदुःखात ते लगेच तत्परतेने धावून येतात व अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात. आज 5 डिसेंबर रोजी त्यांच्या शपथविधीला 1 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे आम्ही 4 शहरांत एक सर्व्हे केला. लोकांना सरकारच्या कामगिरीविषयी काय वाटते? हा प्रश्न केला. त्यात 70 टक्के लोकांनी आपण सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचा फिडबॅक दिला, असेही लोढा म्हणाले.
नवी दिल्ली : गुरुवारी ५०० हून अधिक आणि शुक्रवारी ४०० हून अधिक उड्डाणे रद्द झाल्यामुळे, प्रवाशांचा संताप अनावर झाला आणि अनेक विमानतळांवर त्यांनी गोंधळ घातला. यात सामान्य प्रवाशांसोबतच सिंगापूरचे भारतातील उच्चायुक्त सायमन वोंग यांच्यासारख्या उच्च-प्रोफाइल व्यक्तींनाही देवघरला जाणारे उड्डाण रद्द झाल्याने मोठा फटका बसला. इंडिगोच्या या गोंधळामुळे इतर विमान कंपन्यांनी अचानक प्रवाशांच्या दरात मोठी वाढ […] The post ‘इंडिगो’वरून सरकार बॅकफूटवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दोन पासपोर्ट प्रकरणी अब्दुल्ला आझमला ७ वर्षांची शिक्षा
रामपूर : उत्तर प्रदेशातील रामपूर न्यायालयाने समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम याला दोन पासपोर्ट प्रकरणात दोषी ठरवले असून ७ वर्षांचा तुरुंगवास आणि ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. भाजप आमदार आकाश सक्सेना यांच्या तक्रारीनंतर अब्दुल्ला आझम आणि इतरांविरुद्ध २०१९ साली कलम ४२० (फसवणूक), ४६७, ४६८ (बनावट ओळखपत्र) आणि ४७१ अंतर्गत खटला दाखल […] The post दोन पासपोर्ट प्रकरणी अब्दुल्ला आझमला ७ वर्षांची शिक्षा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाने एक विशेष जनजागृती उपक्रम राबवला. या अंतर्गत, पर्वती येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलमध्ये पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यातून शालेय विद्यार्थ्यांना बाल गुन्हेगारीचे गंभीर परिणाम समजावून सांगण्यात आले. या पथनाट्यातून दोन मुलांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला. एका मुलाचे कुटुंब कष्टकरी आणि शिक्षणाला प्राधान्य देणारे होते, तर दुसऱ्या मुलाचे कुटुंब दारूच्या व्यसनाने त्रस्त होते. दारू पिणाऱ्या वडिलांमुळे बिघडलेले घरगुती वातावरण आणि पैशासाठी दुकानात अपमान सहन केल्यानंतर गुन्हेगारीकडे वळणाऱ्या मुलाची मानसिक घुसमट यात प्रभावीपणे मांडण्यात आली. पथनाट्याच्या शेवटी, एका सुजाण मित्राने केलेल्या योग्य प्रबोधनामुळे तो मुलगा चुकीच्या मार्गावरून परत येतो आणि शिक्षण-संस्कारांच्या दिशेने वाटचाल सुरू करतो, असा सकारात्मक संदेश देण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव प्रमिला गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, शाळेचे मुख्याध्यापक अजित माने आणि संजय भैलुमे उपस्थित होते. किशोर साव व विशाल भैलुमे यांनी या पथनाट्याचे दिग्दर्शन केले. यावेळी बोलताना अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव प्रमिला गायकवाड म्हणाल्या की, लहान वयात मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तीचे आकर्षण वाटू शकते. यासाठी काही वेळा पालक आणि नेते मंडळी जबाबदार असतात. केवळ मुलांनाच नव्हे, तर पालकांनाही याबद्दल जागरूक करणे आवश्यक आहे. मुलांमध्ये संयम आणि ताकद निर्माण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले की, मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे बाल गुन्हेगारांची संख्या वाढली आहे. ही संख्या कमी करण्यासाठी शासन, पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्था चांगले काम करत आहेत. मात्र, पालकांनी लहान वयात मुलांना मोबाईल देणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले. उदय जगताप यांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले की, पुण्यातील गणेशोत्सव मंडळे बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी सक्रिय आहेत. परमेश्वराची खरी सेवा मंदिरात नसून समाजातील गरजूंची सेवा करण्यात आहे. परमेश्वराची मंदिरे केवळ देवदेवतांच्या मूर्तींची न राहता समाजसेवेची महामंदिरे व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप यांनी माहिती दिली की, त्यांचे मंडळ गुन्हेगारी कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबवते. पुण्यातील गुन्हेगारी वाढू नये यासाठी मंडळाने शहरातील २० शाळांमध्ये 'प्रकाशवाटा गुन्हेगारी मुक्तीच्या' हा उपक्रम सुरू केला आहे. याशिवाय, पुणे शहरात 'संवाद परिवर्तन यात्रा' देखील काढण्यात येणार आहे. शहरातील गणेश मंडळे या उपक्रमात मदत करत आहेत. शाळा, समाज आणि पोलीस एकत्र आल्यास शहरातील गुन्हेगारी निश्चितपणे कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहकारी संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा ब्रेक
मुंबई : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सहकाराच्या आखाड्यातील द्वंद पुन्हा थंडावले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने याविषयीचे शासकीय परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे सहकार पंढरीत आता राजकीय बेलभांडारा उधळल्या जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. […] The post सहकारी संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा ब्रेक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निवडून दिले म्हणजे सर्व अधिकार तुमच्याकडे असे नाही
नाशिक : प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे नाशिकच्या तपोवनात आले असता त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली असून निवडून दिले म्हणजे म्हणजे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत असे नाही. सर्वसामान्य माणसाचा विचार केला पाहिजे. मोठी झाडे तोडायची आणि नवीन झाडं लावायची हे चूक आहे. काही माणसे मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचे, असे कुठे होते का असा […] The post निवडून दिले म्हणजे सर्व अधिकार तुमच्याकडे असे नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात
नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या अधिवेशनाच्या तयारीसाठी तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे तयारीला वेग आला आहे. ८ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यावर्षी एकाच आठवड्यात अधिवेशन असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रवी भवनमधील मंत्र्यांचे बंगले, आमदार निवासस्थान स्वागतासाठी सज्ज होत आहे. येत्या ७ तारखेपासूनच मंत्री आणि आमदार […] The post अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हुंड्यासाठी छळ; विवाहितेची आत्महत्या:सासरच्यांवर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लग्नानंतर वेगवेगही कारणे सांगून विहितेतला पैशाची मागणी करून हुंड्यासाठी वेळोवेळी त्रास दिल्याने तिने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनिषा सिन वीर (32, रा. लाडोबा वस्ती, पांडुरंग ट्रेडसृ, केसनंद) असे आत्म्हत्यया केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रामचंद्र दिलीप बुरटे (35) आणि सिमिती दिली बुरटे (50, दोघेही रा. , रा. नवदुर्गाकिरणा शॉपजवळ, लाडबा वस्ती, केसनंद, पुणे मुह रा. कासाई, गाव भोरवाडी ता. खेड, जि. रत्नागिरी ) यांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत पिडीत महिलेच्या आईने वाघोली पोलिस ठाण्यात आरोपीं विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2022 बरुटे दाम्पत्याचे लग्न झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादीकडे वेगवेगळी कारणे सांगून पैशाची मागणी केली. मागणी पुर्ण न झाल्याने विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ आरोपींनी केला. गाडीचे दोन हफ्ते राहिले असे सांगितले. त्यानंतर मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत. लोणीकंद परिसरातील दोन मुलींचे अपहरण लोणीकंद परिसरात प्रत्येकी 15 आणि 12 वर्षाच्या दोन मुलींचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दि. 3 डिसेंबर रोजी त्या अज्ञात असल्याचा फायदा घेऊन त्यांचे अपहरण करण्यात आले असल्याने पोलिसांनी दाखल केलेलया तक्रारीत सांगितले आहे. गुन्ह्यसाचा पुढील तपास लोणीकंद पोलिस करत आहेत.
माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक धोरणांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, केंद्र सरकारच्या घिसाडघाईच्या आणि पूर्वतयारीविना लागू केलेल्या धोरणांमुळे देशभरातील विमानसेवा कोलमडली आहे. यामुळे लाखो विमान प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. जोशी यांनी निदर्शनास आणून दिले की, इंडिगो विमानसेवा सलग दुसऱ्या दिवशी देशभरात विस्कळीत राहिली. यामुळे सुमारे ५५० हून अधिक विमान उड्डाणे रद्द झाली. पुणे आणि मुंबई विमानतळावर शेकडो प्रवासी अडकून पडले होते. अनेकांच्या नोकरीच्या मुलाखती हुकल्या, लग्नसमारंभात जाणे शक्य झाले नाही, तर काही जणांना गंभीर आजारी नातेवाईकांना भेटता आले नाही किंवा अंत्यदर्शनालाही पोहोचता आले नाही. ही परिस्थिती केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे धोरणात्मक अपयश स्पष्ट करते, असे जोशी म्हणाले. या गोंधळाचे मुख्य कारण डीजीसीएने (Directorate General of Civil Aviation) अचानकपणे लागू केलेले 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन' (FDTL) चे नवीन नियम असल्याचे जोशींनी सांगितले. हे नियम लागू करताना विमान कंपन्यांशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही, मनुष्यबळ उपलब्धतेचा अभ्यास केला नाही, संक्रमण कालावधी दिला नाही किंवा प्रवाशांच्या हिताचा विचार केला नाही. या अचानक नियमांमुळे इंडिगोला मोठ्या प्रमाणात क्रूची कमतरता जाणवली आणि शेकडो उड्डाणे रद्द झाली. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर डीजीसीएने घाईघाईने एक परिपत्रक मागे घेतले, परंतु तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. गेल्या आठवडाभरात लाखो प्रवाशांचे तिकिटांचे आर्थिक नुकसान झाले. अनेकांचे नियोजित कार्यक्रम, नोकरीच्या मुलाखती आणि आपत्कालीन प्रवास कोलमडले. कुटुंबीयांच्या भावनिक प्रसंगांना उपस्थित राहता न आल्याची वेदनाही अनेकांना सहन करावी लागली. हे सर्व केंद्र सरकारच्या धोरणात्मक चुकांमुळे घडले असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे. या परिस्थितीसाठी डीजीसीएतील निर्णय घेणारे अधिकारी, तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हे थेट जबाबदार आहेत, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे. देशभरात गोंधळ माजवणाऱ्या आणि लाखो प्रवाशांना त्रास देणाऱ्या निर्णयांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, नियमावलीत बदल करताना विमान कंपन्यांशी चर्चा करावी, मनुष्यबळ विश्लेषण करावे, संक्रमण कालावधी द्यावा आणि प्रवाशांच्या हिताचे संरक्षण करावे, या गोष्टी केंद्र सरकारने पुढील काळात सुनिश्चित कराव्यात, अशी मागणीही जोशी यांनी केली.
पुण्यात पी. एम. शाह फाऊंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १२ आणि १३ डिसेंबर रोजी विधी महाविद्यालय रस्त्यावरील एनएफडीसी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे होणार आहे. पी. एम. शाह फाऊंडेशनचे संचालक अॅड. चेतन गांधी यांनी ही घोषणा केली. या महोत्सवात देशविदेशातून आलेल्या १४५ हून अधिक लघुपट व माहितीपटांमधून ३१ निवडक चित्रपट दाखवले जातील. अॅड. गांधी यांनी सांगितले की, हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. आसाममधील कचार कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संचालक, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि पद्मश्री डॉ. रवी कन्नन आर यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल. त्यानंतर दुपारी ३ वाजल्यापासून लघुपट व माहितीपट दाखवण्यास सुरुवात होईल. दुसऱ्या दिवशी, १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून चित्रपट पाहता येतील. सायंकाळी ४ वाजता महोत्सवाचा समारोप होईल. या समारोप समारंभात सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणुका दफ्तरदार यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जातील. सर्वोत्कृष्ट लघुपट आणि माहितीपटांना यावेळी गौरवण्यात येईल. अॅड. चेतन गांधी यांनी सांगितले की, यावर्षीही स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. महोत्सवासाठी देशविदेशातून १४५ हून अधिक लघुपट व माहितीपटांनी सहभाग नोंदवला आहे. निवडक ३१ चित्रपटांमध्ये मानसिक आरोग्य, लहान मुलांचे आरोग्य, बाललैंगिक शोषण, महिला आरोग्याचे प्रश्न, अवयवदान, कर्करोग, सामाजिक आरोग्य, स्वच्छता आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या यांसारख्या विविध विषयांचा समावेश आहे. या महोत्सवासाठी भारतासह दुबई, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका, पाकिस्तान, अल्जेरिया, इंग्लंड, बांगलादेश, सेनेगल, फिलिपिन्स, फ्रान्स, ओमान, सौदी अरेबिया, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, सर्बिया आणि इराण यांसारख्या विविध देशांमधून प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. प्रख्यात समीक्षक अनुजा देवधर, डॉ. लीना बोरुडे आणि सामाजिक कार्यकर्त्या नीता मेहता यांनी या लघुपट व माहितीपटांच्या निवड प्रक्रियेचे काम केले आहे. अॅड. गांधी यांनी पुढे सांगितले की, महोत्सवात दाखवले जाणारे लघुपट आणि माहितीपट विविध भाषांमधील असले तरी, ते इंग्रजी सबटायटल्ससह उपलब्ध असतील.
नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात झाली असून त्यासाठी तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पासाठी 1800 झाडांची तोड होणार असल्याची माहिती समोर येताच संतापाची लाट उसळली आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. या निर्णयाचा नागरिक, पर्यावरणप्रेमी, स्थानिक संघटना तसेच अनेक कलाकारांनी याला जोरदार विरोध केला आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला आहे. संसदेत बोलताना खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, नाशिकच्या तपोवन परिसरात साधूग्राम आणि कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली सुमारे 1800 झाडे तोडण्याची चर्चा सुरू आहे. हा परिसर शहरसाठी महत्त्वाचा तर आहेच आणि महत्त्वाचे म्हणजे हा परिसर पक्षी आणि जैवविविधतेचे केंद्र आहे. नागरिक, पर्यावरण प्रेमी आणि विविध संस्थांनी या झाडे तोड विरोधात जोरदार आंदोलन सुरू केले असल्याची माहिती वाजे यांनी दिली. वृक्ष तोड तात्काळ थांबवण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा पुढे बोलताना राजाभाऊ वाजे म्हणाले, नाशिकमध्ये साधूग्रामसाठी पर्यायी जागा उपलब्ध असतानाही वनराई असलेल्या पवित्र तपोवनाची निवड का करण्यात आली, याबाबत प्रशासनाकडून पारदर्शक प्रक्रिया दिसत नाही. स्थानिक प्रशासनाने घेतलेले निर्णय पारदर्शक नसून पर्यावरण परिणाम अहवाल, लोकांसोबत संवाद आणि तज्ञांचे मत विचारात न घेता ही प्रक्रिया वेगाने पुढे नेली जात आहे. झाडे ही निसर्गाची फक्त सजावट नाही, तर भविष्यातील हवामान सुरक्षिततेची हमी आहे. त्यामुळे माझी केंद्र सरकारकडे स्पष्ट मागणी आहे की तपोवन परिसरातील सर्व वृक्ष तोड तात्काळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून पर्यावरण व विकास यांचा तोल राखणारा पर्याय निवडावा, अशी मागणी वाजे यांनी केली आहे. समोपचाराने तोडगा काढला पाहिजे- अजित पवार दरम्यान, या वृक्ष तोडीच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे देखील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. याच सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचाराने तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचले तरच पुढची पिढी सुरक्षित राहील, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
विदेशात मराठी शिक्षण योजना कागदावरच:दौऱ्यांनंतरही प्रगती नाही; माहितीसाठी विभागांमध्ये टोलवाटोलवी
महाराष्ट्र सरकारने मोठ्या गाजावाजा करत सुरू केलेली विदेशातील मराठी शिक्षण प्रशिक्षण योजना केवळ कागदावरच राहिली आहे. चार वर्षांपूर्वी घोषणा होऊनही आणि मराठी भाषा मंत्री व अधिकाऱ्यांनी अनेक परदेश दौरे करूनही, अद्याप कुठेही मराठी भाषा शिक्षण प्रशिक्षण सुरू झालेले नाही. माहिती अधिकारात (RTI) मिळालेल्या माहितीतून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नागपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मराठी भाषा विभागाकडे यासंदर्भात माहिती मागितली होती. त्यांनी कोणत्या संस्थांसोबत सामंजस्य करार (MOU) झाले, त्यांची प्रत, त्यानुसार कुठे मराठी भाषा शिक्षण प्रशिक्षण सुरू झाले, त्याचे स्वरूप, तसेच या कामासाठी कोणत्या अधिकाऱ्यांनी विदेशात किती दौरे केले आणि त्यावर किती खर्च झाला, याची सविस्तर माहिती विचारली होती. मराठी भाषा मंत्री आणि विभागातील अधिकाऱ्यांनी जपान व इतर देशांचे दौरे केल्याची वृत्त प्रसिद्ध झाली होती. या पार्श्वभूमीवर कोलारकर यांनी ही माहिती मागितली होती. मात्र, मराठी भाषा विभागाने माहिती देण्याचे टाळत, संबंधित अर्ज शालेय शिक्षण विभागाकडे पाठवून जबाबदारी झटकली. शालेय शिक्षण विभागानेही हा अर्ज राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे (SCERT) पाठवला. SCERT ने महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाकडून (MSOSB) तपशील प्राप्त करून देण्याचे सांगत टाळाटाळ केली. त्यांनी केवळ इंडोगावा इंडिया कल्चरल सेंटर आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यात ३१ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या एका सामंजस्य कराराची (MOU) प्रत उपलब्ध करून दिली. या प्रकरणात मराठी भाषा विभागाने माहिती देण्याचे टाळले, तर SCERT च्या अधिकाऱ्यांनी विदेशात भेटी दिल्या नाहीत, अशी विचारली नसलेली आणि दिशाभूल करणारी माहिती दिली. प्रत्यक्षात विदेशात कोणी भेटी दिल्या, हे सांगण्याचे मराठी भाषा विभाग आणि SCERT या दोघांनीही टाळले आहे. संबंधित सामंजस्य करारात नमूद केलेले कोणतेही काम झाल्याची माहिती पुरवण्यात आलेली नाही. त्यामुळे विदेशातील मराठी शिक्षण प्रशिक्षणाची सोय प्रत्यक्षात कुठेच केली गेली नसून, ही योजना केवळ कागदावरच आणि तीही एकाच संस्थेसोबत झालेल्या सामंजस्य करारापलीकडे पुढे सरकलेली नाही, हे स्पष्ट होते.
शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते वरळी येथील सेंट रेजीस हॉटेलमध्ये कामगार युनियनवरून एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. सेंट रेजीस हॉटेलच्या बाहेर जवळपास अर्धा ते पाऊण तास हा गोंधळ सुरू होता. तसेच गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कामगार युनियनमधील काही कार्यकर्त्यांनी भाजपच्या अखिल भारतीय कर्मचारी संघात प्रवेश केला. भाजपच्या याच फोडाफोडीच्या विरोधात ठाकरे गटाची भारतीय कामगार सेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजप प्रणित अखिल भारतीय कामगार संघाचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टळला. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत कामगार कार्यकर्ते का टिकत नाहीत, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा खोचक सल्ला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. तर असली फोडाफोडी आम्हाला मान्य नाही, आम्ही शांत बसणार नाही, असे ठाकरे गटाच्या कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना भाजप पदाधिकाऱ्याने सांगितले की, सेंट रेजीसमध्ये भारतीय जनता पक्षाची युनियन होतीच. आजही काही कार्यकर्ते आमच्याकडे आले. आमच्या युनियनचा बोर्ड लावण्यासाठी आम्ही आलो होतो जेणेकरून कामगारांचा युनियनशी चांगला संपर्क राहील आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी आम्हाला आवाज उठवता येईल. परंतु, ठाकरे सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी उगीचच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. भाजपने कोणतीही संघर्षाची भूमिका घेतलेली नाही, असे त्यांनी सांगितले आहे. राडा करणाऱ्यांवर कारवाई करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरम्यान, वरळी येथे झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राडा करणाऱ्यांवर कारवाई करणार असून सगळ्यांना कामगार युनियनमध्ये त्यांच्यामनाप्रमाणे काम करण्याचा अधिकार आहे. संविधानानुसार सगळ्यांना मनाप्रमाणे काम करू द्यावे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

29 C