राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत अक्षय शिवाजीराव कर्डिले यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. भाजपने कर्डिले कुटुंबावर विश्वास दाखवत अक्षय कर्डिले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी अक्षय कर्डिले यांना संधी देण्यात आल्याचे मानले जात आहे. स्थानिक पातळीवर कर्डिले कुटुंबाचा प्रभाव लक्षात घेता भाजपने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. आता या उमेदवारीमुळे राहुरीत निवडणूक रंगणार असून, विरोधक कोण उमेदवार देणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांबाबत होत असलेल्या दाव्यांवरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराणी ताराराणी यांना जैन धर्माशी जोडण्याच्या वक्तव्यांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हंबीरराव मोहिते जैन होते का? असा थेट सवाल करत त्यांनी या प्रकरणामागे काहीतरी वेगळा हेतू असल्याचा आरोप केला. राऊत म्हणाले की, महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांच्या पत्नी आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. त्यांनी औरंगजेबाविरुद्ध मोठा संघर्ष केला आणि स्वराज्यासाठी झुंज दिली. अशा शूर वीरांगनेचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राऊतांनी सांगितले. हिंदू मराठा परंपरेत जन्मलेल्या ताराराणींना वेगळ्या धर्माशी जोडणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणावरून राऊतांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत असे वक्तव्य झाले, तरी त्यांनी निषेध केला नाही, अशी टीका त्यांनी केली. धर्मांतरविरोधी कायदा असताना अशा प्रकारे ऐतिहासिक व्यक्तींचे धर्मांतर दाखवले जात असेल, तर त्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या सत्ताकाळात महाराष्ट्राच्या विचारांवर परिणाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. राऊतांनी पुढे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये जैन संस्कृतीचा प्रभाव वाढत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. जैन फूड, जैन पाणी, जैन संस्कृती सर्वत्र लादली जात आहे, असे म्हणत त्यांनी या प्रवाहावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामुळे महाराष्ट्राची ओळख बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. मंत्री मंगल प्रभात लोढांनाही टोला दरम्यान, या वादात मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे नाव चर्चेत आल्यावरही राऊतांनी त्यांच्यावर टीका केली. ताराराणी स्वराज्यासाठी लढल्या, लोढा टॉवर उभारण्यासाठी नाहीत, असे म्हणत त्यांनी इतिहासाचे ज्ञान असावे, असा टोला लगावला. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, ऐतिहासिक वारसा आणि ओळख यावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
हिंगोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते व पुलांच्या बांधकामापोटी रखडलेल्या तब्बल 252 कोटी रुपयांच्या देयकासाठी निधीची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात ता. 31 मार्च रोजी केवळ 15.83 कोटी रुपयांचाच निधी मिळाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे कंत्राटदारांमधून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आता नव्याने कामे करायची कशी असा प्रश्न बांधकाम विभागासमोर उभा राहिला आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे जाळे तयार केले जाते. नवीन रस्ते बांधकामासोबतच पुलाचे बांधकामही याविभागाकडून केले जाते. त्यासाठी कामांच्या निवीदा काढून कंत्राटदारांमार्फत कामे केली जातात. त्यानंतर कामांच्या पुर्णत्वावरून देयके सादर झाल्यानंतर राज्याच्या बांधकाम विभागाकडे निधीची मागणी नोंदवून निधी प्राप्त झाल्यानंतर कंत्राटदारांची देयके अदा केली जातात. साधारणतः मार्च अखेरीच जास्तीत जास्त निधी मिळत असल्याने बांधकाम विभागासह कंत्राटदारांचे लक्ष मार्च अखेरीस येणाऱ्या निधीकडे असते. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य महामार्गच्या बांधकामाच्या 50 कामांसाठी 105 कोटींची मागणी नोंदवली होती. मात्र शासनाकडून केवळ 8.56 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. प्रमुख जिल्हा मार्गाच्या 46 कामांसाठी 130 कोटींच्या निधीची मागणी नोंदवली होती मात्र त्या तुलनेत केवळ 6.46 कोटी रुपयांचाच निधी देण्यात आला. तर राज्य महामार्गावरील पुलांच्या 4 कामांसाठी 4 कोटींच्या निधीची मागणी केली मात्र त्यासाठी केवळ 24 लाख रुपयांचा निधी मिळाला असून प्रमुख जिल्हा मार्गावरील पुलांच्या 13 कामांसाठी 13 कोटींची मागणी नोंदवली असतांना केवळ 55 लाख रुपयांचाच निधी मिळाला आहे. दरम्यान, शासनाकडून निधी वाटप करण्यास हात आखडता घेण्यात आल्यामुळे मिळालेला तुटपुंजा निधी वाटप करायचा कसा असा प्रश्न बांधकाम विभागासमोर उभा राहिला आहे. तर दुसरीकडे उधार उसणवार करून काही ठिकाणी स्वतःच्या पैशातून कामे केल्यानंतरही शासनाकडून देयकांसाठी निधी मिळाला नसल्याने कंत्राटदारांमधून असंतोष निर्माण झाला आहे. आता मिळालेला निधी वाटप करतांना बांधकाम विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
पुण्यातील विविध प्रश्नांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडणाऱ्या रील स्टार संतोष पंडित यांच्यावर एका महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर महिलांच्या अंगावर धावून जाणे व अवमानास्पद शिवीगाळ करून धमकावण्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सदर घटना सोमवारी पुण्यातील ग्राहक पेठ परिसरात घडली. त्या दिवशी घटनास्थळी गुलाबो गँग आंदोलन सुरू होते. त्यासाठी शहरातील अनेक कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू होते. त्याचे वार्तांकन करण्यासाठी पीडित महिला पत्रकार तिथे आल्या होत्या. त्यावेळी संतोष पंडित यांचा त्यांच्याशी वाद झाला. त्यात संतोष पंडित यांनी महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला. महिला पत्रकाराच्या तक्रारीनुसार, तुमच्यामुळे वाहतूक कोंडी होते, असे म्हणत संतोष यांनी त्यांच्याशी वाद झाला. पण त्यानंतर मर्यादा ओलांडत महिला पत्रकारावर अश्लील शेरेबाजी केली. एवढेच नाही तर पत्रकाराच्या कपड्यांवरही त्यांनी टिप्पणी केली. तसेच महिला पत्रकाराची परवानगी न घेता त्यांचा व्हिडिओही मोबाईलमध्ये शूट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून घटनास्थळी उपस्थित इतर आंदोलनकर्त्या महिलांनी या वादात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण संतोष पंडित यांनी त्यांच्याही अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. हा प्रकार असह्य झाल्यानंतर आंदोलक महिला व पीडित पत्रकारांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 75, 78, 352, 351(2) व 296 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना संतोष पंडित यांच्याविरोधात आणखी काही तक्रारी असतील तर न घाबरता पुढे येण्याचेही आवाहन केले आहे. कल्याणचा रील स्टार सुरेंद्र पाटील पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात दुसरीकडे, डोंबिवली येथील रील स्टार सुरेंद्र पांडुरुंग पाटील याच्यावरही पोलिसांनी पुन्हा एकदा अटकेची कारवाई केली आहे. सुरेंद्र पाटील हा सोशल मीडियावर गँगस्टर स्टाईल व्हिडिओमुळे ओळखला जातो. त्याच्यावर बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच तो एका प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता. पण अवघ्या 2 आठवड्यांतच त्याला पुन्हा बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ठाणे क्राईम ब्रांचने शनिवारी मध्यरात्री दावडी येथील त्यांच्या बंगल्यावर छापा टाकला. त्यात घरातील शू रॅकमध्ये एक गुप्त कप्पा आढळून आला. या कप्प्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा लपवून ठेवण्यात आला होता. या कारवाईत पोलिसांनी 7 बंदुका, 371 जिवंत काडतुसे व 167 एअर गनच्या गोळ्या जप्त केल्या. याशिवाय तलवार, चाकू, कोयते व इतर धारदार शस्त्रेही जप्त करण्यात आली. या शस्त्रांची किंमत सुमारे 10 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. जप्त करण्यात आलेल्या बंदुकांपैकी 5 देशी पिस्तुल आणि रिव्हॉल्वर असून काहींवर 'Made in USA' व 'Special Auto' अशी नक्षी आढळली आहे. हा संपूर्ण शस्त्रसाठा वापरासाठी तयार स्थितीत होता, असे पोलिसांनी सांगितले.
पुण्यातील स्वयंघोषित रील स्टार संतोष पंडित याच्याविरोधात पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (30 मार्च) टिळक रस्त्यावर घडली. नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाच्या निषेधार्थ टिळक रस्त्यावरील एका महाविद्यालयाजवळ आंदोलन सुरू होते. या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी संबंधित महिला पत्रकार घटनास्थळी उपस्थित होत्या. त्याचवेळी संतोष पंडित तिथे आला. पंडितने पत्रकारांवर संताप व्यक्त करत अर्वाच्य भाषेत बोलण्यास सुरुवात केली. त्याने महिला पत्रकाराच्या कपड्यांवरून अश्लील टिप्पणी केली, अपमानास्पद नजरेने पाहिले आणि अश्लील हावभाव केले. तसेच, तिच्या इच्छेविरुद्ध मोबाईलमध्ये चित्रीकरणही केल्याचे समोर आले आहे. याशिवाय, आंदोलनात सहभागी झालेल्या इतर महिलांशीही संतोष पंडितने आक्रमकपणे गैरवर्तन करत शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. संबंधित महिला पत्रकाराने दिलेल्या तक्रारीवरून पर्वती पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 75, 78, 352, 351(1) आणि 296 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिला पत्रकाराने सांगितले की, रियल स्टार संतोष पंडित हा पुण्यातील विविध ठिकाणी पत्रकार एखाद्या आंदोलनाचे किंवा कार्यक्रमाचे वार्तांकन करत असतील तर त्या ठिकाणी जाणीवपूर्वक येतो.स्वतःला प्रसिद्धी मिळावी याकरिता तो पत्रकारांचा बदनामीचा प्रयत्न देखील सातत्याने करतो. अशोक खरात विरोधात आंदोलन सुरू असताना त्याने अशा प्रकारे महिला पत्रकारास दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष महाले करत असून, पुढील चौकशी सुरू आहे.या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, संतोष पंडितविरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी 'डिझाईन बॉक्स'चे नरेश अरोरा यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. अजितदादांच्या विमानाचा घातपात की अपघात, या चर्चेमागील खरा 'सूत्रधार' अरोरा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात विद्यमान आमदारांना तिकीट मिळू नये म्हणून खोटे सर्व्हे सादर करणे आणि पक्षाच्या जोरावर स्वतःची विमान कंपनी उभी करणे, असे धक्कादायक मुद्दे मिटकरींनी या पोस्टद्वारे मांडले आहेत. अमोल मिटकरी म्हणाले की, नरेश अरोराने अजितदादांना शरद पवारांवर टीका करण्याचा सल्ला दिला होता, जो दादांनी फेटाळून लावला. जे आमदार अरोराच्या सांगण्यानुसार वागत नसत, त्यांच्याबद्दल दादांची दिशाभूल करण्याचे काम या यंत्रणेने केले. तरीही ते आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने अरोराचे पितळ उघडे पडले आहे. या सर्व आरोपांची उत्तरे दिल्याशिवाय अरोराने महाराष्ट्र सोडू नये, असा इशाराही मिटकरी यांनी दिला आहे. मिटकरींची नेमकी पोस्ट काय? राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, अजितदादांच्या विमानाचा घातपात की अपघात या चर्चेतील मुख्य व लक्ष नसलेलं एक पात्र म्हणजे डिझाईन बॉक्स वाला गडी,नरेश अरोरा ! आता पुढील काळ निवडणुका नसल्याने याचं पक्षातील काम संपल असल तरीही काही बाबी दादांवर जीव ओवाळणाऱ्या जनतेला माहित असाव्या म्हणून हा शब्द प्रपंच..राष्ट्रवादीतील सध्या निवडून आलेल्या आमदारांना तिकीट देऊ नये म्हणून चुकीचे सर्व्हे करून याने दादाना दिले मात्र तेच आमदार 50 हजारांहून अधिक मतांनी निवडून आले.डिझाईन बॉक्स च्या सर्व्हेला न जुमानता अजितदादांनी स्वतःच्या यंत्रणेच्या तिकीट दिले. ही माहिती पक्षातील अनेक आमदारांना आहे. पक्षातील आमदार त्यांना ओळखत नाही राष्ट्रवादीचे आमदार मिटकरी म्हणाले की, पक्षातील एखादा आमदार नरेश अरोरांना भेटत नाही, ओळखत नाही किंवा नमस्कार करत नाही, या कारणांवरून त्या आमदारांविषयी चुकीची माहिती अजितदादांना अरोरा द्यायचा ,सुरुवातीच्या काळात हा संघटनेत प्रामाणिकपणे काम करत असावा असा विश्वास ठेवून अजितदादांनी काही आमदारांना झापलेही; पण नंतर संबंधित आमदारांनी अरोरांशी संबंध सुधारल्यावर त्यांचे रिपोर्ट आपोआप चांगले येऊ लागले .निवडणुकीत अजितदादा अधिक जागा लढवण्याच्या तयारीत असताना याच अरोराने कमी जागा लढवाव्यात, सेना भाजपविरोधात उमेदवार देऊ नयेत, आणि दिल्यास त्यांचा प्रचार करू नये, असे प्रयत्न केले. अजितदादांच्या अनेक सभा रद्द करण्यात आल्या.अजितदादांना या सर्व गोष्टींची जाणीव होती; मात्र ऐन निवडणुकीच्या काळात नवीन प्रचारयंत्रणा उभी करणे योग्य ठरणार नाही म्हणून त्यांनी या गोष्टींमध्ये लक्ष घातले नाही. अरोराला महाराष्ट्राचे राजकारण माहिती नाही आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, पत्रके वाटणे, बॅनर लावणे आणि वातावरण निर्मिती करणे या नावाखाली पक्षाकडून अरोरा आर्थिक लाभ घेत असला तरीप्रत्यक्षात काहीच काम झाले नव्हते.अजितदादांवर विविध माध्यमांतून टीका होत असताना याने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही व कोणतीही प्रभावी प्रतिक्रिया दिली नाही.याला महाराष्ट्राचा इतिहास, राजकारण आणि समाजकारण याविषयी एक टक्काही माहिती नव्हते. 10–12 फोटोग्राफर लावणे आणि दादाना पिंक जॅकेट घालण्याचा सल्ला देणे यापलीकडे अरोराचे कोणतेही ठोस योगदान नव्हते. अरोराने विमान कंपनी स्थापन केल्याची माहिती अमोल मिटकरी म्हणाले की, अजितदादा सत्तेत होते आणि 41 आमदार निवडून आले हे संपूर्ण श्रेय अजितदादांनाच जाते. त्यात इतरांचे व याचे काडीचेही योगदान नव्हते.अजितदादांनी अवाजवी घोषणा कराव्यात अशा सूचना अरोरा द्यायचा मात्र दादांनी स्पष्ट शब्दांत नकार देत सांगितले की, मी जे करू शकतो तेच लोकांसमोर बोलणार, आणि त्यांनी ते काटेकोरपणे पाळले.पवार साहेबांवर टीका करावी अशा सूचना तो द्यायचा मात्र अजितदादांनी त्या कधीही मान्य केल्या नाही राष्ट्रवादीच्या जोरावर अरोराने एक विमान कंपनी स्थापन केल्याची माहिती ऐकिवात आहे. सेकंड-हँड विमान खरेदी केल्याचेही सांगितले जाते.या प्रश्नाची उत्तरे दिल्याशिवाय याने महाराष्ट्र सोडू नये.#सुत्रधार
नांदेड जिल्ह्यातील प्रख्यात शिवव्याख्याते आणि बहुजन चळवळीतील अभ्यासक हभप मधुकर महाराज बारूळकर यांचे रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले. ढवळे कॉर्नर परिसरात दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यांच्या आकस्मिक जाण्याने सामाजिक आणि प्रबोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून जिल्हाभरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथे आयोजित शिव कुटुंब मेळावा संपल्यानंतर मधुकर महाराज दुचाकीवरून आपल्या मूळ गावी बारूळकडे निघाले होते. यावेळी ढवळे कॉर्नर येथे मागून येणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याने उपस्थितांनीही हळहळ व्यक्त केली. कीर्तनातून समाजप्रबोधनाचे कार्य - भाजप आमदार राजेश पवार वारकरी संप्रदाय आणि मराठा समाजाचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांच्या अपघाती निधनाचे वृत्त आपणा सर्वांसाठी दु: खद आणि धक्कादायक आहे. परिवर्तनवादी समाजासाठी आपल्या कीर्तनातून सातत्याने समाजप्रबोधनाचे कार्य करणा-या अशा या पुण्यवंत, महनीय व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो, हीच प्रार्थना! ह. भ. प. मधुकर महाराज बारुळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! समाजाची मोठी हानी - अमोल मिटकरी अत्यंत दुःखद, मराठा सेवा संघाचे प्रबोधनकार व वारकरी परिषदेचे उपाध्यक्ष शिवश्री मधुकर महाराज बारुळकर यांचे अपघाती निधन ! नांदेड येथून परतताना सिडको नांदेड चौकात अपघात समाजप्रबोधनासाठी अहोरात्र झटणारे कीर्तनकार गेले त्यांच्या जाण्याने समाजाची मोठी हानी झाली.भावपूर्ण आदरांजली रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत गेल्या 24 तासांत राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या भीषण अपघातांनी महाराष्ट्र हादरला आहे. नांदेडसह पुणे जिल्ह्यातील महामार्गांवर वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाल्यामुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील विविध महामार्गांवरही वेगवेगळ्या अपघातांमध्ये जीवितहानी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या सलग दुर्घटनांमुळे रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वाढता वेग, निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असून, यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
मुंबईत महायुती सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे चित्र समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका वगळता अनेक मंत्री मंत्रालयात फारसे दिसत नसल्याची चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक मंत्री आपल्या खासगी बंगल्यावरूनच बैठका आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. या बैठकींसाठी मंत्रालयातील मोठा कर्मचारीवर्गही बंगल्यावर हलवला जात असल्याने मंत्रालयातील नियमित कामकाजावर परिणाम होत असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील निर्णय प्रक्रियेत अधिकाऱ्यांची भूमिका वाढल्याचेही दिसून येत आहे. मंत्र्यांच्या अनुपस्थितीत अनेक महत्त्वाचे निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतले जात असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विभागात झालेल्या कारवाईदरम्यानही अधिकाऱ्यांच्या स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे अनेक विभागांमध्ये मंत्र्यांपेक्षा अधिकारीच प्रभावी, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, राज्यात सलग निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मंत्री आपल्या मतदारसंघात अधिक वेळ घालवत असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे मंत्रालयात त्यांची उपस्थिती कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्र्यांच्या दालनांसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता. अशा स्थितीत मंत्रीच मंत्रालयात येत नसतील, तर हा खर्च का केला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मंत्र्यांच्या गैरहजेरीचा परिणाम दैनंदिन प्रशासनावर होत असल्याचीही चर्चा आहे. अनेक फाईल्सच्या निकाली काढण्यात विलंब होत असून निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव जाणवत असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे. मंत्री स्वतः उपस्थित नसल्यामुळे धोरणात्मक निर्णयही अधिकाऱ्यांच्या पातळीवर घेतले जात असल्याने जबाबदारीचे संतुलन बिघडत असल्याचे मत व्यक्त होत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्री-कॅबिनेट बैठकीचे आयोजन दरम्यान, आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्री-कॅबिनेट बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, या बैठकीत काय निर्णय होतो आणि झिरवाळ स्वतः बैठकीला उपस्थित राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. आता पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात त्याच्या मुलीच्या नावावर आलिशान फ्लॅट असल्याची माहिती उघड झाली आहे. ‘24 रत्नम’ या उच्चभ्रू सोसायटीतील सातव्या मजल्यावर सुमारे 1055 चौरस फुटांचा 3 बीएचके फ्लॅट 13 सप्टेंबर 2023 रोजी खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या मालमत्तेमुळे खरातच्या आर्थिक व्यवहारांबाबत संशय अधिक गडद झाला आहे. या फ्लॅटच्या खरेदीत सर्वात मोठा मुद्दा म्हणजे व्यवहाराची पद्धत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या व्यवहारासाठी संबंधित बिल्डरला 1 कोटी 20 लाख रुपये पूर्णपणे रोख स्वरूपात देण्यात आले. सेल डीडमध्ये कोणत्याही प्रकारच्या चेक किंवा बँक व्यवहाराचा उल्लेख नसल्याने संशय आणखी वाढला आहे. लोकांना घाबरवून किंवा फसवून पैसे उकळून विविध शहरांमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा आरोपही तपासात पुढे येत आहे. दरम्यान, अशोक खरातच्या उत्पन्न आणि संपत्तीमध्ये मोठा तफावत असल्याचंही उघड झालं आहे. तो आयकर विभागाकडे केवळ सुमारे 12 लाखांचे वार्षिक उत्पन्न दाखवत होता, मात्र प्रत्यक्षात त्याची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपन्या, बांधकाम प्रकल्प आणि हार्डवेअर व्यवसायातून जीएसटी बुडवल्याचा संशयही आयकर विभागाने व्यक्त केला असून मोठी कारवाई होण्याची चिन्हे आहेत. पुन्हा कोठडी वाढवण्याची मागणी या सगळ्या पार्श्वभूमीवर खरातविरोधातील गुन्ह्यांची मालिका वाढतच आहे. आज त्याला पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याची पोलिस कोठडी संपत आहे. अत्याचार आणि फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये आधीच तीन वेळा कोठडी मिळालेल्या खरातसाठी एसआयटी पुन्हा कोठडी वाढवण्याची मागणी करणार आहे. दरम्यान, त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल असून ती फरार झाली आहे, तर मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलासमोरच चौकशी करण्याची तयारी तपासात सहकार्य न केल्यामुळे आता अशोक खरातची चौकशी त्याच्या मुलासमोरच करण्याची तयारी सुरू आहे. त्याच्याकडून अधिक माहिती मिळवून फरार आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुरुवातीला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करून पुढे आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे. आज न्यायालयात सादर होणाऱ्या पुराव्यांमुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वधस्तंभावर जाण्यापूर्वी सहा दिवस अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताचा यरुशलेम शहरात जयोत्सवाने प्रवेश झाला. त्या दिवसाची आठवण म्हणून संपूर्ण जगभरात आजचा रविवार पाल्म संडे म्हणून साजरा करतात. याला झावळ्यांचा रविवार असेही म्हणतात. अकोला शहर आणि जिल्ह्यातही आज हा सण मोठ्या भक्तिभावाने आणि हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ख्रिश्चन धर्मीयांच्या लेंथ या पवित्र महिन्यास सुरुवात झाली. दरवर्षी या पवित्र महिन्यात ख्रिश्चन धर्मीय घरोघरी कॉटेज प्रेयरचे आयोजन करतात. पाल्म संडेच्या दिवशी, म्हणजे आज सकाळी, विदर्भातील एकमेव अशा ख्रिश्चन कॉलनीमधून झावळ्या हाती घेऊन आबालवृद्धांनी मोठी दिंडी काढली. शहरातील आठ आणि जिल्ह्यातील सुमारे ३० चर्चेसमधून आज प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते. खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हीअर्स अलायन्स चर्चसोबतच इतरही सर्व चर्चेसमध्ये धर्मगुरूंनी बायबलमधील वचनांच्या आधारे संदेश दिला. यावेळी विविध धार्मिक गीते सादर करण्यात आली. संडे स्कूलच्या मुलांनी तसेच महिलांनी यावेळी विशेष गीते सादर केली. हातात झावळ्या घेऊन जगाचे अशांततेपासून संरक्षण व्हावे. सर्वत्र शांतता, बंधुभाव नांदावा. अशी प्रार्थना करून पाल्म संडे भक्तिभावाने आणि हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. ३ एप्रिल रोजी गुड फ्रायडे येत्या शुक्रवारी, ३ एप्रिल रोजी प्रभू येशूच्या वधस्तंभावरील बलिदानाची आठवण म्हणून गुड फ्रायडे, अर्थात उत्तम शुक्रवार, हा सण जगभरात भक्तिभावाने साजरा करण्यात येईल. यावेळी बायबल अभ्यासक प्रभू येशूच्या वधस्तंभावरील सात वाक्यांवर प्रकाश टाकतील. त्यानंतर ५ एप्रिल रोजी रविवारी संपूर्ण जगभर ईस्टर संडे, अर्थात प्रभू येशू यांचा पुनरुत्थान दिन, मोठ्या उत्साहात चर्चेसमध्ये साजरा करण्यात येईल. यावेळी प्रार्थना सभेसोबतच इतरही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जस्टिन मेश्रामकर, सरला मेश्रामकर, अरविंद बिरपॉल, रूबेन वाळके, राजेश ठाकूर, अमित ठाकूर यांनी दिली आहे.
उपचारानंतर एका वृद्धाची प्रकृती ठणठणीत; नातेवाइकांची प्रतीक्षा
दिलीप कृष्णा धरमे (७२, रा. साईनगर, अमरावती) यांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर येथील सर्वोपचार रुग्णालयातील सर्जरी विभागात वॉर्ड -१३ मध्ये (नोंदणी क्रं. ३२४३७५) त्यांच्यावर २६ जानेवारीपासून उपचार करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे. मात्र, त्यांची ओळख पटवण्यासाठी नातेवाइक अद्याप पुढे आले नाहीत. त्यामुळे त्यांना नातेवाइकांची प्रतीक्षा आहे. दिलीप धरमे यांच्यावर उपचार पूर्ण होत आले आहेत. त्यांना बेशुद्धावस्थेत अकोट पोलिस ठाण्यामार्फत रुग्णालयात एमएलसी केस म्हणून उपचारासाठी दाखल केले होते. त्यामुळे दिलीप धरमे यांची ओळख पटल्यास किंवा त्यांचे कोणी नातेवाइक असल्यास त्यांनी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे (मोबाईल क्रं.- ८३८०८३०१८२) यांच्याशी संपर्क साधावा. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांच्या मार्गदर्शनात आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. शामकुमार सिरसाम यांच्या देखरेखीत रुग्णालयातील सर्जरी विभागाचे प्रमुख तथा पथक क्रमांक-२ चे प्रमुख डॉ. अरविंद आडे, डॉ. राजेश चिंचोलकर, डॉ. अवनीश देशमुख, डॉ. अभिजीत बंकुवाले, डॉ. सिदार्थ सिंग बघेल, डॉ. पसूला प्रणितकुमार यांनी दिलीप धरमे यांच्यावर यशस्वी उपचार केले. वॉर्ड परिसेविका सुनीता सैतवाल, वंदना मोरे, परिचारिका शिल्पा शिरसाट, नम्रता गोमासे, किरण श्रीराव, प्रीती आगरे, रेश्मा शेख, रक्षा जाधव, सुनील मेटे, कक्षसेवका विश्रांती कांबळे, सफाई कामगार बबलू दावत हे रुग्णांची देखभाल व काळजी घेत आहेत. अनोळखी रुग्णाचे नातेवाइक आल्यावर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. दरम्यान त्यांचे पुनर्वसन, मदत व समन्वय करण्याचे कामकाज अकोट पोलिस ठाण्यामार्फत समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे करणार आहेत. तसेच त्यांना मदतनीस म्हणून अमित मिटकरी (वैद्यकीय समाजसेवक) करत आहेत. दरम्यान उपचारानंतर त्यांच्या देखील जगण्यासाठीच्या अशा पल्लवीत झाल्याने त्यांना देखील नातेवाईकाच्या भेटीची आस लागली आहे.
स्वरांजलीतून आईच्या स्मृतींना अभिवादन; आठवणींचे प्रतिबिंब
निर्वाणस्थ लीलादेवी माहोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमांमध्ये भावनांचा ओलावा आणि समाजसेवेची जाणीव यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. आईच्या निधनानंतर तेरा दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित स्वरांजली कार्यक्रमाने उपस्थितांना भावूक केले. या स्वरांजली कार्यक्रमात सादर झालेल्या गीतांमधून दिवंगत आईच्या आठवणींना जिवंत उजाळा मिळाला. प्रत्येक सुरात तिचे अस्तित्व जाणवत होते, तर प्रत्येक गीत तिच्या आयुष्याच्या आठवणींचे प्रतिबिंब बनले होते. अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या क्षणी वातावरण इतके भारलेले होते की, उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. याच निमित्ताने २९ मार्च रोजी संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हृदय रोगनिदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन लीला कठाणे यांच्या हस्ते झाले.या शिबिरात शंभरहून अधिक रुग्णांनी हृदय तपासणी करून घेतली. ईसीजीसह विविध तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आल्या. या वेळी डॉ. शिवराज शिंदे, डॉ. माधव खंडारे, डॉ. अंकुश निकम, डॉ. पूर्वा बारस्कर यांनी सेवा दिली. तसेच राजेंद्र दिगंबर व बादल वाघ यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रज्ञा मनवर, अंजू अंबोने, सविता सायनारे, रवीना मोहोड, शिवानी मोंढे, वैष्णवी गोडांगे, प्रांजली भाकरे, विशाखा खैरे यांनी विशेष योगदान दिले. तसेच पत्रकार राज माहोरे, जयंत मनोहर, मुन्ना मकेश्वर, पिंटू बनसोड, प्रदीप शापामोहन, गोपाल मेंढे, संदीप दहाट, प्रशिक मकेश्वर, अक्षय माहोरे, प्रशिक शापामोहन, विशाल शापामोहन, नितीन माहोरे आदींनीही परिश्रम घेतले. कार्यक्रमावेळी माहोरे कुटुंबातील अश्विनी माहोरे, नितीन माहोरे, मीनाक्षी माहोरे, राज माहोरे, शीतल माहोरे, सचिन माहोरे, सुनंदा माहोरे, अर्चना माहोरे, अधिराज अवर्जुन हे उपस्थित होते.
उद्या, परवा ढगाळ तर शुक्रवारपासून कडक ऊन:हवामान खात्याचा विदर्भात 2 दिवस यलो अलर्ट
जिल्हाभरात सोमवारी रात्री वादळी पावसाने तडाखा दिला. त्यामुळे फळबागांसह पिकांचे नुकसान झाले. परंतु मंगळवारी दिवसभर वातावरण सामान्य राहिले. बुधवार व गुरुवारी जिल्ह्यातील वातावरण काही प्रमाणात ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, शुक्रवार, ३ एप्रिलपासून अकोलेकरांना पुन्हा कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात बुधवारच्या रात्री थोड्या प्रमाणात पावसाळी वातावरण असणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातील काही भागात तुरळक पावसाची शक्यता नाकारता येत नाही, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले. दरम्यान, उत्तर व दक्षिण भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि जमिनीवरील कोरडे वारे एकत्र आले. यामुळे वातावरणात काही प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली आणि याच्या परिणामी ढग तयार होऊन विदर्भात सोमवारी रात्री वादळी पाऊस झाला. तसेच अकोल्याचे तापमान सोमवारी तब्बल ४१.३ अंशांवर पोहोचले होते. त्यामुळे जमीन मोठ्या प्रमाणात तापली. त्यामुळे हवा हलकी होऊन वर गेली. त्यात अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे ढग तयार होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. मध्य भारतातील चक्रवातामुळे पाऊस ^मध्य भारतात चक्रवाताची स्थिती निर्माण झाली होती. यामुळे वातावरणातील खालच्या थरात बाष्पाचे प्रमाण वाढले होते. यामुळे विदर्भातील अकोल्यासह काही जिल्ह्यांमध्ये गारांसह अवकाळी पाऊस कोसळला. - प्रा. डॉ. सुरेश चोपने, हवामानतज्ञ.
गतवर्षीच्या खरीप, रब्बीनंतर यंदाच्या उन्हाळ्यातही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल ३१ मार्च रोजी पुढे आला. जिल्ह्यातील सुमारे ६५३.३ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली असून यात कांदा, चिया, गहू, लिंबू भाजीपाला पिकांची नासाडी झाली आहे. पुढील चार दिवस जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा धास्तावले आहेत. गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस जिल्ह्यात झाला होता. जिल्ह्यात वर्षात सरासरी ६९३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ७३२ मि.मी. पाऊस झाला होता. खरीप नंतर रब्बीमध्येही अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कमी जाणवेल, असा सामन्यांचा अंदाज होता. मात्र फेब्रुवारी महिन्यात अखेरच्या आठवड्यात तापमान ३५ अंश सेल्सियसपेक्षा जास्त नोंदवण्यात आले. मार्चमध्येही प्रचंड तापले. २ मार्च रोजी तर अकोल्यात भारतात सर्वाधिक ३८.५ सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. Q : पंचनामे कसे होणार? A : अवकाळी पावसामुळे सध्या प्राथमिक पाहणी झाली आहे. यानंतर कृषी, महसूल ग्राम विकास (अर्थात जि.प.) विभागातील कर्मचारी पाहणी करून संयुक्त पंचनामे करतील. त्यानंतर या तीनही विभागांच्या प्रमुखांच्या स्वाक्षरीचा अहवाल नुकसान भरपाई अपेक्षित निधीसह विभागीय आयुक्तांना सादर होईल. Q : नुकसान भरपाई कशी व केव्हा मिळेल? A : नुकसान भरपाईसाठीचे एनडीआरएफचे निकष ठरलेले असून, किती हेक्टरसाठी किती भरपाई हे निश्चित आहेत. त्यानुसार विशेष बाब म्हणून शासनाने मंजूर केल्यानंतर थेट संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात मदत डिबीटीद्वारे मिळेल. Q : यापूर्वी किती नुकसान झाले व मदत मिळाली होती का? A : जिल्ह्यात गतवर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण ३ लाख २५ हजार ४६५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. बहुता:श शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. उन्हाळ्यात दुसऱ्यांदा नुकसान {जिल्ह्यात १९ फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. त्यानंतर २० मार्च रोजी पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने १२२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला होता. २.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. {जिल्ह्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने पिकांच्या नुकसानीची मंगळवारी सकाळी पाहणी करण्यात आली. नजर अंदाजाच्या प्राथमिक पाहणीनुसार एकूण ६५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. ५.६ मि.मी. पाऊस पडला. {मूर्तिजापूर तालुक्यातील ८ गावांमध्ये १८.३ हेक्टर क्षेत्रातील कांदा, चिया, गहू, लिंबू, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. {अकोला तालुक्यातील ३६ गावांमध्ये ६३४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली. यात ज्वारी, कांदा, गहू, भाजीपाला उद्धस्त झाला. {तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी येथील सखाराम सोमा झिटे यांच्या मालकीच्या ५ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. शेतशिवारात वीज पडल्याने मेंढ्या दगावल्या.
महानगर पालिकेच्या विशेष आमसभेत नगरसेवकांनी चार तास महानगर पालिकेच्या ४ बीओटी तत्त्वावरील तसेच २३ सर्वसाधारण व्यापारी संकुलांच्या दुकानांच्या गाळ्यांवर भाडेवाढ करण्यात यावी, यासाठी जोरदार चर्चा केली. कारण, मनपाला त्यांचे उत्पन्न वाढवायचे आहे. मनपाच्या बजेट सभेत या व्यापारी संकुलांपासून ४ कोटी ५० लाख रु. भाडे वर्षाला अपेक्षित धरण्यात आले. यावर विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्याचप्रमाणे सभागृह नेते चेतन गावंडे व प्रशांत देशपांडे यांनीही एकिकडे मालमत्ता कर थकित असलेल्यांवर आपण कारवाई करीत असताना व्यापारी संकुलांमधील गाळ्यांची भाडेवाढ करण्याबाबत निश्चितच विचार व्हायला हवा, अशी विनंती सभापती श्रीचंद तेजवानी, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर व मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांना केली. सोबतच बाजार व परवाना विभागाच्या एकूणच कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करण्यात आला. हा विभाग स्वत:च्या स्वार्थासाठी या गाळ्यांवर वाढीव दराने अद्याप भाडे निश्चित करण्यात दिरंगाई करीत असल्याचा ठपकाही नगरसेवकांद्वारे ठेवण्यात आला. समितीची तत्काळ बैठक घेऊन भाडेवाढ निश्चित करावी. ही भाडेवाढ प्रत्येक परिसरात असलेले बाजार भावानुसार असावी, याकडेही नगरसेवकांनी लक्ष वेधले. कारण, गेल्या काही वर्षांपासून भाडेवाढ करण्यास बाजार परवाना विभागाद्वारे टाळाटाळ केली जात आहे. एकूण २७ व्यापारी संकुलांकडून वर्षाला किमान १० कोटी रु. भाडे वसूल करण्यात यावे, असेही यावेळी सुचवण्यात आले. परंतु, काही नगरसेवकांनी ही भाडेवाढ जरा जास्तच आहे. त्याऐवजी किमान ७ कोटी भाडेवाढ केली जावी, अशी सुचना केली. यावर सभापतींनीही त्यांचे अनुमोदन देत भाडेवाढीबाबत तत्काळ विचार करण्यात यावे, असे निर्देश दिले. शासनाकडून मनपाला येणाऱ्या निधीचे काही खरे नाही. तो कधी वेळेवर मिळत नाही. अशात शहरातील विकासकामे करण्यासाठी मनपाला स्वत:चे उत्पन्न वाढवणे गरजेचे असल्याचे सूरही बजेट सभेत सभागृहात उमटले. महानगर पालिकेच्या मालकीची एकूण २७ व्यापारी संकुलं आहेत. त्यापैकी ४ बीओटी तत्त्वावर दिली असून या चारही व्यापारी संकुलांमधील गाळ्यांचा भाडेपट्टा (लीज) करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे या चारही व्यापारी संकुलांसह इतर २३ व्यापारी संकुलांसाठी नव्याने भाडे निश्चित करून त्याची आकारणी केली तर महानगर पालिकेला चांगले उत्पन्न मिळू शकते. कारण, बाजार भावानुसार तसेच आधीच्या दराच्या दुप्पटीपेक्षा कमी भाडे यावेळी आकारावे लागणार आहे. यासाठी मनपाने शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. महानगर पालिका क्षेत्रातील ४ बीआटी तत्त्वावरील व्यापारी संकुलातील गाळ्यांचे भाडे वगळता इतर २३ ही व्यापारी संकुलातील गाळ्यांचे भाडे हे १ रु. चौरस फुट दराने आकारले जात आहे. हे फारच नगण्य असून यात सध्याच्या काळात जो बाजारभाव आहे. त्यानुसार दर आकारणी करणे आवश्यक आहे. राजकमल चौकातही हाच दर आकारला तर तो योग्य नाही. या व्यापारी संकुलातील गाळ्यांमधून व्यावसायिक लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. ते बघता भाडेवाढ आवश्यक असल्यावर बजेट सभेत जोर देण्यात आला. मनपाकडे २७ व्यापारी संकुले, ४ बीओटीची
श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित महात्मा फुले कला, वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय, वरूड येथे प्राणीशास्त्र विभागाद्वारे नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मधमाशी पालन पद्धती याविषयावर एकदिवसीय कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप हांडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा तालुक्यातील भेमडी या गावातील कृष्णा धुर्वे यांच्या शेतात घेण्यात आली. मधमाशीपालन विषयातील तज्ञ डॉ. बी. एस. रहिले यांनी विद्यार्थ्यांना मधमाशी पालन हा कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय असून तो विद्यार्थ्यांसाठी स्वावलंबनाचे प्रभावी साधन ठरू शकतो असे सांगितले. मधमाशा शेतीतील परागीभवन प्रक्रियेस मोठा हातभार लावतात. त्यामुळे पीक उत्पादनात वाढ होते तसेच मधमाशी पालनाची मूलभूत संकल्पना, विविध जाती, लाकडी पेटीतील मधमाशी वसाहतीचे व्यवस्थापन, रोग नियंत्रण आणि मध संकलन प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली. मधमाशी पालन म्हणजे लाकडी पेटीत मधमाश्यांचे संगोपन करून मध, मेण व इतर उत्पादने मिळविण्याची शास्त्रीय पद्धत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत्रा पट्ट्यात वऱ्हाडातील पीकपद्धतीमुळे मधमाशीपालनासाठी पोषक वातावरण आहे. कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मधमाशी पेटी (हाईव्ह) हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये सुरक्षितता उपाय, हंगामी व्यवस्थापन आणि मध काढण्याच्या आधुनिक पद्धतींचा समावेश होता. अशा प्रकारचे प्रशिक्षण ग्रामीण युवकांना रोजगार निर्मितीसाठी उपयुक्त ठरते, असेही डॉ. बी. एस. रहिले यांनी नमूद केले. कार्यशाळेत प्रा.डॉ. पुरुषोत्तम गेडाम यांनी मधमाशा हाताळण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत कार्यशाळा अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार समन्वयक प्रा. खुशाल इंगळे यांनी मानले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक नव्हे तर व्यावसायिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची ठरली असून भविष्यात अशा अधिक कौशल्यविकास उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्राणीशास्त्र विभागाद्वारे कळविण्यात आले. कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्याकरिता विभाग प्रमुख डॉ. एस. आर. कोंडुलकर यांचे मार्गदर्शन आणि डॉ. व्ही. एस. पंचवटे यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याधारित शिक्षण विकसित करण्याचे प्रयत्न नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याधारित शिक्षण विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांना विशेष महत्त्व दिले जात आहे. कृष्णा धुर्वे यांनी त्यांच्या शेतात मधमाशी वसाहत ठेवल्यामुळे तूर, संत्रा, पेरू, आंबा इत्यादी पिकामध्ये परागसिंचन होऊन ३० ते ४० टक्के उत्पादन वाढ झाल्याचे दिसून आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची भावना वाढीस लागेल, असा विश्वास यावेळी डॉ. रहिले यांनी व्यक्त केला.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागातर्फे तसेच आयक्युएसीच्या सहकार्याने ‘मोबाईल रिपेअरिंग तंत्रज्ञान' या विषयावर एकदिवसीय हॅण्ड्स-ऑन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत पार पडला. या ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी होऊ शकतो. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी भूषवले होते. आपल्या भाषणातून प्राचार्य डॉ. बोडखे यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देताना मोबाईल रिपेअरिंगसारख्या कौशल्यांद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी कशा निर्माण होऊ शकतात, यावर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यशाळेला मोबाईल रिपेअरिंग तज्ज्ञ ज्ञानेश्वर वानखडे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचे विविध भाग, त्यांचे कार्य, सामान्य बिघाडाची कारणे व ते दुरुस्त करण्याच्या प्रत्यक्ष पद्धती प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितल्या. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने उपकरणे वापरून मोबाईल दुरुस्तीचे प्रत्यक्ष अनुभव घेतले. या कार्यक्रमात भौतिकशास्त्र विभागाचे बीएस्सी द्वितीय व तृतीय वर्षाचे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमास उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्यांस भौतिकशास्त्र विभागातर्फे ‘सहभाग प्रमाणपत्र' प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ.संतोष उके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राखी भागवत यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.डॉ. सुशील डी. चरपे यांनी केले. महाविद्यालयात असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल व विद्यापीठ व आंतरमहाविद्यालयीन स्तरावरील विविध स्पर्धेमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ.अतुल बोडखे व उपस्थित सर्व मान्यवरांनी कौतुक केले. सदर कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे आयक्युएसी समन्वयक डॉ.मनीष होले तसेच वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा.डॉ. नंदकिशोर गोपकर व प्रा.ज्ञानेश्वर कदम प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री हनुमान जयंती उत्सवानिमित्त जिल्ह्यात सर्वत्र चैतन्यमय वातावरण आहे. प्रसिद्ध व जागृत श्री हनुमान देवस्थानांसह विविध लहान-मोठ्या मंदिरांमध्ये हनुमान चालिसा पाठ, श्रीराम कथा, श्री राम चरित मानसचा अखंड पाठ, महाआरती, प्रवचन, भजन, सुंदरकांड असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे वातावरणात भक्तीरसाचा संचार झाल्याचा भास होत आहे. श्री हनुमान जयंतीच्या दिवशी बहुतेक मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सप्ताहभर विविध कार्यक्रमांची रेलचेल राहिले. मंदिरांना रंगरंगोटीकरून केळीचे खांब, आंब्याच्या पानाचे तोरण, बजरंग बलीच्या मुर्तीवर शेंदूराचा लेप, विद्युत रोशनाईने सजवण्यात आले आहे. रवीनगर येथील मंदिरापुढे शेणाचा सडा टाकून त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. नुकतेच येथे सलग ११ वेळा हजारो भाविकांनी सामूहिक हनुमान चालिसा पठण केले. बुधवारी येथे १ एप्रिलला देखण्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून चांगापूर येथेही अभिषेक, पूजन, हनुमान चालिसा पाठ व इतर धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. श्री महारुद्र मारुतीचे शक्तीस्थळ व प्रेरणास्थळाच्या नावाने हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जहागीरपूरच्या श्री महारुद्र मारुतीच्या दर्शनार्थ श्री हनुमान जंयतीनिमित्त करण्यात आलेल्या विभिन्न आयोजनात भाविक हजर होऊन श्री धन्य होणार आहेत.बुधवार १ रोजी रात्री ११.३० वाजता पासून गुरुवार २ एप्रिलच्या पहाटे ४ पर्यंत मंदिरात श्री महालघू रुद्राभिषेक पं. शत्रुघ्न पांडे व त्यांच्या ११ सहकार्याद्वारे केला जाईल. सकाळी ४ ते ५.३० वाजेपर्यंत मंदिरात उपस्थित हजारो स्त्री-पुरुष भाविकांद्वारे हनुमान जन्मोत्सवाची महाआरती होवून प्रसाद वितरण होईल. सकाळी १० वाजता पासून दुपारी ४ वाजे पावेतो भक्त निवासात महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. धामणगावपासून २५ कि.मी.महापदयात्रा आज दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्ह्यात धामणगांव रेल्वे येथून बुधवार १ एप्रिल रोजी रात्री पदयात्रा निघणार असून गुरुवार २ रोजी सकाळी शेकडो भक्त महापदयात्रेने श्री क्षेत्र जहागीरपुरला येणार आहेत. रात्रीतून हे भाविक सुमारे २५ कि.मी.अंतर पार करतील. ही अनेक वर्षांची परंपरा आहे. त्यांचे स्वागत-सत्कार संस्थानतर्फे हनुमानजंयतीला करण्यात येणार आहे.
मालवाहू वाहन पुलाखाली कोसळून दोन महिला ठार:6 गंभीर जखमी, लवादा ते दुणी मार्गावरील घटना
मेळघाटातील लवादा गावातील महिलांना शेती कामासाठी घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाला अपघात झाला. महिला मजूर बसलेले हे वाहन चालकाकडून अनियंत्रित होऊन थेट पुलाखाली कोसळले. यामध्ये दोन महिला मजुरांचा मृत्यू झाला तर चालकासह सहा जण जखमी झाले आहे. हा अपघात लवादा ते दुणी मार्गावरील अलई नदीच्या पुलाजवळ मंगळवारी (दि. ३१) पहाटे साडेसहा वाजता घडला आहे. समाय चुन्नीलाल सावलकर (४०) आणि मालती मिठाराम भिलावेकर (१८, दोघीही रा. लवादा ता. धारणी) असे मृतक महिलांची नावे आहेत. समाय, मालती यांच्यासह अन्य पाच ते सहा महिला मजूर दुणी येथे शेती कामासाठी जात होत्या. त्या सर्व महिला मालवाहू वाहनात बसल्या होत्या. दरम्यान लवादापासून काही अंतरावर असलेल्या अलई नदीच्या पुलाजवळ चालकाला वाहन अनियंत्रित झाले आणि पुलापासून ५० मीटरपुर्वीच वाहन रस्त्याच्या थेट खाली जाऊन कोसळले. सुमारे २० ते २५ फुटावरून भरधाव वाहन कोसळल्यामुळे वाहनात बसलेल्या सर्वांनाच जबर दुखापत झाली. यामध्ये समाय सावलकर आणि मालती भिलावेकर या दोघींची प्रकृती अत्यंत गंभीर होती. अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात पोहोचवण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी समाय आणि मालती या दोघींना मृत घोषित केले. उर्वरित. पान ४ २२ फेब्रुवारीला गेले ५ बळी मेळघाटातील देडतलई ते कंजोरी मार्गातील शिवझारी घाटात तब्बल २५ प्रवासांना घेऊन जाणारे मालवाहू वाहन थेट ६० फूट दरीत कोसळले होते. हा अपघात २२ फेब्रुवारीला झाला होता. या अपघातात घटनास्थळी चौघांचा तर उपचारादरम्यान एका महिलेचा असा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर दहा जण जखमी झाले होते. त्या अपघातानंतर १६ मार्चला वरुड तालुक्यातील २५ कामगार नागपूर जिल्ह्यात संत्रा तोडीसाठी जात असताना त्यांच्याही मालवाहू वाहनाला अपघात झाला होता. त्या अपघातातसुध्दा २० मजूर जखमी झाले होते. त्यामुळे मालवाहू वाहन कामगारांच्या जीवावर उठले असल्याचे मागील ३५ दिवसात झालेल्या तीन अपघातांतून समोर येत आहे.
भगवान महावीर स्वामी यांचा २६२५ वा जन्मकल्याणक दिवस बार्शीत उत्साहात साजरा करण्यात आला. जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर आणि ‘जिओ और जीने दो’ तसेच अहिंसेचा संदेश देणाऱ्या श्री भगवान महावीरांच्या स्मरणार्थ सकल जैन समाजाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने श्री वर्धमान जैन स्थानक येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. रथात भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान करण्यात आली. ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत श्री जैन श्वेतांबर ऋषभदेव मंदिर येथे समाप्त झाली. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत केले. उत्सवात महिला व पुरुषांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. भगवान महावीर स्वामींच्या जन्मोत्सवानिमित्त स्वर्गीय पन्नालालजी मोहनलालजी श्रीश्रीमाळ यांच्या वतीने समाज बांधवांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवानिमित्त एक अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी यांच्या वतीने गरजू व गोरगरिबांना १०१ पादत्राणांचे मोफत वाटप करण्यात आले. या जैन समाजाच्या वतीने वर्षभर “जीवदया”, “जैन झुणका भाकर केंद्र”, “श्री महावीर धर्मार्थ दवाखाना” आणि “श्री नवकार जैन सेवातीर्थ” अंतर्गत सुमारे २५० गायींचे संगोपन असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत केले. यावेळी आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, प्रतिनिधी | कुर्डुवाडी दि.३१(प्रतिनिधी) कुर्डुवाडी शहरात दिगंबर श्वेतांबर सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर जयंती निमित्त भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत अग्रभागी पंचरंगी ध्वज घेतलेले पथक, त्यानंतर ढोल,ताशा,बॅण्ड पथक, पाठोपाठ श्रावक, पालखी, श्राविका, भगवान महाविरांचे तैलचित्र असलेला रथ मुख्य मार्गावरून मार्गस्थ झाला. भगवान महावीर स्वामी की जय,जैन धर्म की जय असा जयघोष यावेळी करण्यात आला. ठिकठिकाणी पालखीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी सुहास शहा, फुलचंद धोका,शीतल तांबोळी, डॉ.विलास मेहता,चेतन शहा ,महेश गांधी, विरकुमार मेहता,सचिन शहा संकेत दोशी,रोहित पुर्वत,राजेश गांधी,अॅड.प्रमोद पलसे, अजित पुर्वत, नितीन लऊळकर,राहुल सोळंकी,डॉ.संतोष दोशी,डॉ.आशिष शहा,डॉ निशांत शहा, डॉ.लकी दोशी,डॉ.हर्षद शहा,सुनील पुर्वत,प्रकाश शहा,अनिल पलसे,अक्षय शेटे, महावीर बाठिया,अमित तांबोळी,केतन संचेती,राजेश बलदोटा,डॉ.घेवरचंद धोका, मंदार शहा,विलास संचेती,हरकचंद डागळे,विनोद दोशी, घेवरचंद बाठिया, केशर सोनिमिंडे,विशाल पुर्वत,नवजीवन पापरीकर,आनंद कोठारी, सुदीप बहिरशेठ, किरण दोशी,राहुल शहा,संतोष दोशी,विनय भाळवणकर आदी मान्यवर सहभागी झाले होते.मिरवणुकी नंतर अनंतनाथ दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर प्रतिमेस अभिषेक करण्यात आला. येथील नगरपालिका सभागृहातही भगवान महावीर जन्म कल्याणक साजरे करण्यात आले. यावेळी कै काशिनाथ भिसे सभागृहात नगराध्यक्षा जयश्री भिसे यांच्या हस्ते भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी उपनगराध्यक्ष सविता जगताप ,नगरसेविका वृषाली गांधी, मोहसिन मकणु,संजय टोणपे,शुभ्रा गोरे, वासिम मुलाणी,आनद कदम, शकील तांबोळी ,अबोली चौधरी ,भाग्यश्री पाटील, बापूसाहेब जगताप,संतोष क्षीरसागर ,विशाल गोरे आदी नगरसेवक यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरात श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीच्या सहकार्याने एकूण ७८ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात युवकांसह महिला वर्गाचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला. हे शिबिर श्री वर्धमान नवयुवक मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, भाऊसाहेब आंधळकर, नागेश अक्कलकोटे, वर्षा ठोंबरे, असिफ तांबोळी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री ऋषभ जैन श्वेतांबर मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष सुमतीलाल मुनोत, शैलेश वखारिया, जयचंद सुराणा, दिनेश श्रीश्रीमाळ, पद्मचंद कांकरिया, श्री आदींनी विशेष परिश्रम घेतले. या शोभायात्राचे शहरात ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. भक्तिभावात सांगता झाली.
पंढरपूर विठ्ठलाच्या चैत्री यात्रेनिमित्त वाखरी येथील पालखीतळावर भरणारा जनावरांचा बाजार यंदा पूर्णपणे थंड पडला आहे. पशुपालकांनी या बाजाराकडे पाठ फिरवल्यामुळे जनावरांची आवक, खरेदी-विक्री आणि बाजारातील एकूण आर्थिक उलाढाल या सर्वच स्तरावर हा बाजार कमालीचा निराशाजनक ठरला आहे. केवळ १०० जनावरे बाजारात विक्रीसाठी आली होती. रविवारी सांगोल्याचा जनावर बाजारामुळे पंढरीतील बाजार अल्प प्रमाणात भरला. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वाखरी येथील पालखी तळावर जनावरांचा बाजार आयोजित केला जातो. कार्तिकी, चैत्री, माघ या तीन यात्राच्या वेळी जनावरांचा बाजार भरवला जातो. दरवर्षी चैत्री यात्रेला ८००-१००० एवढ्या जनावरांची आवक होत असते. मात्र, मात्र यंदा वाखरी येथील तळावर जेमतेम १०० ते ११० च्या आसपास गायी, बैल आणि म्हशी दाखल झाल्या होत्या. व्यापाऱ्यांची संख्याही अत्यंत नगण्य असल्याने बाजारात कोणतीही मोठी आर्थिक उलाढाल दिसून आली नाही. पशुपालकांप्रमाणेच शेती उपयोगी साहित्य विकणाऱ्या व्यावसायिकांनीही बाजाराकडे पाठ फिरवल्याने बाजार ओस पडली होता. यंदा बाजारावर अनेक संकटांचे सावट दिसून आले. तापमानातील प्रचंड वाढीमुळे जनावरांना प्रवासात आणि बाजारात सांभाळणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्या खर्चात झालेली वाढ आणि इंधनाची उपलब्धता यामुळे पशुपालकांनी बाजारात येणे टाळले. वीज, पाणी, स्वच्छता, आरोग्य यासह विविध प्रकारच्या सोयी-सुविधा दिल्या होत्या. इतकी पूर्वतयारी असूनही पशुपालक आणि ग्राहकांच्या अल्प प्रतिसादामुळे बाजार समितीच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे. एकूणच, यंदाचा चैत्री यात्रेतील जनावरांचा बाजार आर्थिकदृष्ट्या नीचांकी ठरल्याची चर्चा व्यापारी आणि शेतकरी वर्गात सुरू आहे. चैत्री यात्रेनिमित्त भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात दरवर्षी फार गर्दी नसते. कार्तिकी आणि माघ यात्रेच्या तुलनेत चैत्रीचा बाजार कमीच भरतो. त्यातच यंदा नेमके शनिवार आणि रविवार दोन दिवस सांगोला येथील जनावरांचा बाजार आल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि व्यापारी सांगोला बाजाराकडे गेले. त्याचाही परिणाम चैत्रीच्या बाजारावर झाल्याचे दिसून आले. कुमार घोडके, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती .संपूर्ण बाजार तळावर विजेची व्यवस्था. .जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय. .स्वच्छता , प्राथमिक आरोग्य सोयी. .तातडीच्या मदतीसाठी पशुवैद्यकीय पथक. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सांगोला येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो. त्याठिकाणी उत्तर कर्नाटकसह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील जनावरे, व्यापारी येतात.
आरोग्यदायी जीवनासाठी विषमुक्त अन्न महत्त्वाचे आहे. प्रार्थना फाऊंडेशनच्या या उपक्रमातून तयार होणारा भाजीपाला नागरिकांनी खरेदी करावा आणि विषमुक्त अन्नाच्या दिशेने योग्य पाऊल टाकावे, असे आवाहन सुप्रसिद्ध व ज्येष्ठ सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी प्रार्थना फाऊंडेशनला भेटी दरम्यान केले. प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून मोरवंची येथे अनाथाश्रम व वृद्धाश्रम चालविण्यात येत असून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले,वंचित,अनाथ, निराधार तसेच भिक्षा मागणाऱ्या मुलांचा आणि अनाथ,निराधार,बेघर वृद्ध आजी-आजोबांचा सांभाळ केला जातो. या समाजोपयोगी प्रकल्पाला भेट देण्यासाठी सुप्रसिद्ध व ज्येष्ठ सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी प्रार्थना फाऊंडेशनला भेट दिली.आश्रमातील मुलांशी तसेच वृद्ध आजी- आजोबांशी संवाद साधला.मुलांनी अभ्यास करावा, कष्ट करावे, आणि सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभे राहावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. तसेच त्यांच्या या प्रेरणादायी भेटीमुळे आश्रमातील मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान, प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि अविरत फाऊंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या विषमुक्त सेंद्रिय शेती प्रकल्पाचे उद्घाटन मकरंद अनासपुरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः पहिले ग्राहक बनून विषमुक्त भाजीपाला विकत घेतला. याप्रसंगी सरपंच सूर्यभान धोत्रे, उपसरपंच सौदागर साठे, अमोल सावंत, प्रार्थना फाऊंडेशनच्या सचिव अनु मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
जुगारासाठी कोंबड्यांची झुंज:एलसीबीचा छापा, 21 ताब्यात
अहिल्यानगर तालुक्यातील पोखर्डी शिवारातील पिंपळगाव उजनी रोडवरील एका मोकळ्या जागेमध्ये कोंबड्याची झुंज लावून त्यावर जुगार खेळणाऱ्या २१ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कोंबड्यांसह २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम राजेश बोध (रा. झेंडीगेट), आशरफ बाहुला खान (रा. आलमगीर), मोहम्मद उस्मान अली शेख (रा. मुंबई), अमजद युसुफ मगदुम (रा. पुणे), सय्यद अझर अक्तर (रा. पंचपिर चावडी), रोहीत श्रीचंद गोहिर (दरेवाडी, अहिल्यानगर), संदिप ओमप्रकाश कुडीया (रा. वसंत टेकडी अहिल्यानगर), राम हिरालाल क्षत्रिय (नाशिक), तौफिक सिकंदर शेख (रा. नेवासा), अजहर खुदाबक्श शेख (रा. मुकुंदनगर), योगेश मनोहर छजलांनी (रा. दरेवाडी), संतोष गणेश गोयल (रा. शाहापुर, अहिल्यानगर), विकी लक्ष्मण सुजगोहर (रा. येरवडा पुणे), जितेंद्र चंद्रकांत म्हात्रे (रा. भिवंडी जि.ठाणे), अमीन सरदार शेख (रा. गजराजनगर, अहिल्यानगर), तुषार संतोष मुलतांनी (रा. मगळवार पेठ पुणे), समीर फिरोज शेख (रा. अकोले नाका संगमनेर), वसीम सलीम शेख (रा. येरवडा पुणे), गोविंद शाम राजुडीया (रा. पुणे), सोहेल कबीर सय्यद (रा. मुकुंदनगर), उत्तम एकनाथ साळवे (रा. देवळाली कॅम्प, नाशिक) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोखर्डी शिवारात जुगारासाठी कोंबड्यांची झुंज लावण्यात आली होती. पैशांसाठी प्राण्यांची झुंज लावणे दखलपात्र गुन्हा प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यानुसार मनोरंजनासाठी किंवा पैशांसाठी प्राण्यांची झुंज लावणे किंवा त्यासाठी जागा उपलब्ध करून देणे हा दखलपात्र गुन्हा आहे. पहिल्यांदा गुन्हा सिद्ध झाल्यास १० ते ५० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. मात्र, तीन वर्षांच्या आत पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंड किंवा ३ महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळल्यास जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही कारवाई केली जाते.
महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा मान उंचावणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान हर्षवर्धन सदगीर आणि उदयोन्मुख पैलवान चेतन रेपाळे यांचा पारनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज कुस्ती संकुलात सन्मान सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज कुस्ती संकुलाचे संचालक,नगरसेवक, पहिलवान युवराज पठारे यांनी हर्षवर्धन सदगीर यांना १ लाख ११ हजार रुपये, तर चेतन रेपाळे यांना ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करत त्यांच्या पुढील स्पर्धांच्या तयारीसाठी आर्थिक पाठबळ दिले. आमदार काशिनाथ दाते यांनीही हर्षवर्धन सदगीर यांना २५ हजार रुपये आणि चेतन रेपाळे यांना ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. याशिवाय खडकवाडी गावातील कुस्ती शौकिनांनीही ११ हजार रुपयांची मदत जाहीर करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. या घोषणांमुळे खेळाडूंना आगामी राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी मोठा आधार मिळणार आहे. महाराष्ट्र केसरी हा किताब दोनदा पटकावणे ही अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेची बाब मानली जाते. पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी सातत्यपूर्ण मेहनत, कठोर सराव आणि जिद्दीच्या जोरावर हा मान पटकावला आहे.पैलवान चेतन रेपाळे यांनीही दमदार कामगिरी करत आपली छाप पाडली असून भविष्यात तेही महाराष्ट्र केसरीसारखा मान पटकावतील,असा विश्वास यावेळी वक्त्यांनी व्यक्त केला. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन ॲड. बाबासाहेब खिलारी,नगरसेवक युवराज पठारे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव चेडे,भाजप जिल्हा सरचिटणीस सुभाष दुधाडे, बाळासाहेब पठारे, कुंडलिक पठारे, पांडुरंग खोडदे, डॉ. बाळासाहेब कावरे, नगरसेवक अशोक चेडे, नवनाथ सोबले, कांतीलाल ठाणगे, भुषण शेलार, दत्तानाना पवार, लहू भालेकर आदी उपस्थित होते. तरुणांनी क्रीडा क्षेत्रात भवितव्य घडवावे ^ महाराष्ट्र केसरीसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत यश मिळवणे ही मोठी अभिमानाची बाब आहे.ग्रामीण भागातील युवकांनी कुस्ती क्षेत्रात केलेली ही कामगिरी प्रेरणादायी आहे. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी आहे.तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून क्रीडा क्षेत्रात भवितव्य घडवावे. -काशिनाथ दाते, आमदार
मोबाइलचा गरजेपुरताच वापर करून ध्येय गाठा:नियमदर्शनाजी महाराज यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
भगवान महावीर यांचे जीवनकार्य अत्यंत व्यापक आणि त्यागाचे होते. त्यांनी दिलेली दया, क्षमा, शांती आणि अहिंसेची शिकवण आजही मार्गदर्शक आहे. विद्यार्थ्यांनी आजच्या काळात मोबाईलचा केवळ गरजेपुरताच वापर करावा आणि उदात्त ध्येय साध्य करावे, असे आवाहन परमपूज्य नियमदर्शनाजी महाराज यांनी विद्यार्थ्यांना केले. वांबोरी येथील महेश मुनोत विद्यालयात भगवान महावीर जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मुनोत विद्यालयात तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रास्ताविक बी. एम. पटारे यांनी केले. याप्रसंगी प्रियलश्रीजी महाराज, डॉ. ज्ञानप्रभाजी महाराज यांच्या शिष्या पुष्पचुलाजी, सुप्रिया दर्शनाजी आणि अंशूश्रीजी महाराज यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय समितीचे हेमंत मुथा, सुरेखा मुथा, अमृता बिहानी, बबलू मुथा, राजू झंवर, सुधाकर ससे यांच्यासह प्राचार्या शुभांगी देशपांडे, उपप्राचार्य बाळासाहेब वाबळे, आदी उपस्थित होते. नियमदर्शनाजी महाराज म्हणाल्या, उद्याच्या यशात आजची मेहनतच महत्त्वाची ठरते. मी सदैव सर्वोत्तम करेन आणि यशापर्यंत पोहोचेन, अशी भावना विद्यार्थ्यांनी बाळगायला हवी, असेही त्यांनी सांगितले. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.
प्रभू हनुमान यांच्या जीवनातून नि:स्वार्थ सेवा, अढळ श्रद्धा आणि धैर्याचा आदर्श समाजासमोर येतो. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा अंगीकार करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे आवश्यक आहे. संतांचे विचार आत्मसात करून सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे निरुपण श्रीराम महाराज मचे यांनी केले. नालेगाव येथील गाडगीळ पटांगण येथे श्री हनुमान जयंतीनिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहात श्रीराम महाराज मचे यांची कीर्तन सेवा भक्तिमय वातावरणात झाली. त्यावेळी ते बोलत होते. कीर्तनातून प्रभू हनुमान यांच्या कार्याचा गौरव करत भक्ती, शक्ती आणि निस्वार्थ सेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. मचे महाराज म्हणाले, भारतीय संस्कृतीमध्ये प्रभू हनुमान यांना भक्ती, पराक्रम आणि नि:स्वार्थ सेवेचे प्रतीक मानले जाते. रामायणातील त्यांच्या अद्वितीय कार्यामुळे ते आजही कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. प्रभू हनुमान यांनी श्रीरामाप्रती अखंड निष्ठा ठेवत आपल्या जीवनातील प्रत्येक कार्य समर्पित केले आणि आपल्या पराक्रमाने धर्मरक्षणाचे कार्य केले. ते पुढे म्हणाले की, सीतेचा शोध घेण्यासाठी समुद्र ओलांडून लंकेत प्रवेश करणे, रावणाच्या दरबारात निर्भयपणे श्रीरामाचा संदेश देणे, अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणे आणि लंकेला आग लावून पराक्रमाचे दर्शन घडवणे हे त्यांच्या धैर्याचे उत्तम उदाहरण आहे. तसेच राम-रावण युद्धाच्या वेळी लक्ष्मण मूर्च्छित झाल्यावर संजीवनी बूटी आणण्यासाठी संपूर्ण पर्वत उचलून आणण्याचा प्रसंग हा त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, वेग आणि समर्पणाचे उत्कृष्ट प्रतिक आहे. कीर्तनादरम्यान श्री प्रभू हनुमान यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे जिवंत वर्णन करण्यात आले. त्यांच्या कार्याचे वर्णन ऐकताच उपस्थित भाविक वर्ग अक्षरशः मंत्रमुग्ध झाला होता. काही काळ परिसरात स्तब्ध आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण गाडगीळ पटांगण दुमदुमून गेले. नालेगाव येथे माजी नगरसेवक दत्तात्रेय मुदगल यांच्या पुढाकारातून गेल्या अनेक वर्षांपासून हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असून या माध्यमातून धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपली जात आहे. या प्रसंगी माजी नगरसेवक दत्तात्रेय मुदगल तसेच भाविक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
भगवान महावीर यांच्या जन्माला जन्मकल्याणक म्हटले जाते. जन्मकल्याणक हे आत्म्याला अंधारातून प्रकाशाकडे घेवून जाणारे असते. आपल्याला प्राप्त झालेल्या आत्मज्ञानाचा उपयोग त्यांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी केला. अहिंसा, सत्य आणि अपरिग्रहाचा विचार त्यांनी कायम मांडला. जो आजच्या काळातही तितकाच महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज यांनी केले. अहिंसा परमो धर्म: अशा महान उपदेश देत संपूर्ण जगाला दिशा देणाऱ्या भगवान महावीर स्वामींची जयंती (जन्मकल्याणक) मंगळवारी नगरमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी सकल जैन समाजातर्फे शहरात शोभायात्रा काढण्यात आली. चौक सजावट, रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. आनंदधामच्या प्रांगणात साधूसाध्वीजींनी भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन चरित्रावर प्रवचन दिले. त्यावेळी ते बोलत होते. कापड बाजार जैन मंदिरापासून शोभायात्रेला सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाली. या शोभायात्रेत डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या मुली, पुरुष व महिला सहभागी झाल्या होत्या. भगवान महावीर स्वामींची भव्य प्रतिमा असलेले वाहन रथ होतो. कापडबाजार जैन मंदिर येथून निघालेली शोभायात्रा शहरातील विविध मार्गांवरून धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम येथे दाखल झाली. रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. त्रिशलानंदन वीर की, जय बोलो महावीर की अशा घोषणा देण्यात आल्या. आनंदधाम येथे महाराष्ट्र प्रवतर्क कुंदनऋषी महाराज, प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज, आलोकऋषीजी महाराज आदिठाणा, महासतीजी सेवाभावी सत्यप्रभाजी, दिव्यदर्शनाजी, सम्यक दर्शनाजी, कंचनकवरची, अर्चनाजी महाराज, चंदनबालाजी, राजस्थानी प्रवर्तनी सुधाजी, अनूपज्योतीजी, आभाजी आदि समस्त विराजित महासतीजी आदींच्या उपस्थितीत प्रवचन झाले. ब्राम्ही युवती मंचच्या सदस्यांनी भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली. महिलांनी डॉ. सुधा कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली 'बेटी बचाव बेटी पढाओ'ची शपथ घेतली. वेळी श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत, कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा, बडीसाजन श्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, श्रावक संघाचे सेक्रेटरी संतोष बोथरा, उपाध्यक्ष आनंदराम मुनोत, अशोक बोरा, संतोष गांधी, डॉ. सुधा कांकरिया आदी उपस्थित होते. आदर्शऋषीजी महाराज म्हणाले, आज हजारो वर्षानंतरही भगवान महावीर स्वामींचे विचार मानव जातीला तारणारे आहेत. यातूनच त्यांची महानता कळून येते. आपण भगवान महावीरांचे अनुयायी आहोत याचा अभिमान बाळगला पाहिजे. चौक सजावट व रांगोळी स्पर्धेतील विजेते चौक सजावट स्पर्धेत प्रथक - गुगळे परिवार (चितळे रोड), व्दितीय : बोथरा परिवार (आडते बाजार), तृतीय - दिगंबर जैन मंदिर, महाजन गल्ली, उत्तेजनार्थ - जय आनंद फौंडेशन, आडते बाजार, जय आनंद महावीर युवक मंडळ, नवीपेठ, वर्धमान तरूण मंडळ, ख्रिस्त गल्ली. रांगोळी स्पर्धेत प्रथम : गुगळे परिवार (चितळे रोड) रोहित, स्नेहल, काजल, रचना, सिया गुगळे. द्वितीय : दर्शना, प्रेक्षा नहार, रॉयल फर्निचर, नवीपेठ, तृतीय - दिगंबर जैन मंदिर, महाजन गल्ली, सपना कासलीवाल, उत्तेजनार्थ - आरती कटारिया, मिनल पारख, राखी गांधी, पूनम चोरडिया, बोथरा परिवार (आडते बाजार), दीपाली नितीन मुनोत, जय आनंद महावीर युवक मंडळ नवीपेठ, रूपाली काठेड, महाजन गल्ली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महापालिकेने शहरातील ओढे आणि नाल्यांच्या साफसफाईच्या कामाचे नियोजन सुरू केले आहे. नालेसफाईसाठी ३५ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख अभियंता अनिकेत बल्लाळ व अभियंता सुरेश इथापे यांच्याशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत.शहर व उपनगरात सुमारे ४१ ओढे व नाल्यांचे प्रवाह आहेत. त्यानुसार साफसफाईचे नियोजन महापालिकेने केले आहे. शहरातील चार ओढे आणि नाल्यांमधून साफसफाई सुरू करावी, असे निर्देश आयुक्त डांगे यांनी दिले आहेत. मे अखेरपर्यंत सर्व ओढे व नाल्यांची सफाई पूर्ण होईल, या दृष्टीने नियोजन करावे. ओढे नाल्यातील गाळ, जलपर्णी काढून प्रवाह मोकळे करावेत. काढलेला गाळ, जलपर्णी तत्काळ उचलून नेऊन त्याची विल्हेवाट लावावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. तब्बल ४.९१ किमीचे ओढे, नाले पाइप टाकून बुजवले महापालिकेने नाशिकच्या कंपनीमार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार पाईप टाकून वळवलेले प्रवाह व बांधकामांची माहिती समोर आलेली आहे. शहरातील उपनगर परिसरातील ९५ किमी लांबीच्या ४१ ओढे व नाल्यांपैकी ८.२३ किमी लांबीचे प्रवाह पाईप टाकून वळवल्याचे, तर ३.३२ किमी लांबीच्या नाल्यांवर इमारतींचे बांधकाम झाल्याचे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात यापूर्वीच समोर आले आहे. नागरिक कृती मंचचे शशिकांत चंगेडे हे गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणांबाबत तक्रारी व पाठपुरावा करत आहेत. मात्र, अद्यापही कारवाई झालेली नाही.
अहिल्यानगर जिल्ह्यावर निसर्गाचा कोप झाला असून, मार्च महिन्यातच अवकाळी पावसाने मोठा मुक्काम ठोकला. मंगळवारी सकाळी कडक ऊन, दुपारी ढगाळ हवामान आणि सायंकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसाने नगरकरांना उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव दिला. यंदा मार्च महिन्यात तब्बल ५ वेळा अवकाळीने हजेरी लावली. गेल्या १३ दिवसांत ८.४ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, गुरुवारपर्यंत जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या पावसाने जिल्ह्यातील २०३ गावांतील १० हजार ८७८ हेक्टरवरील रब्बी पिके उद्ध्वस्त केली आहेत. यापूर्वी १९ आणि २० मार्चला झालेल्या पावसात ११ हजार हेक्टरचे नुकसान झाले होते. म्हणजेच, केवळ मार्च महिन्यात एकूण २१ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पाथर्डी, कर्जत, श्रीगोंदे, नेवासे, शेवगाव, संगमनेर, अकोले, कोपरगाव आणि राहता या नऊ तालुक्यातील २१ हजार ५५६ शेतकरी या संकटामुळे पूर्णपणे खचले आहेत. पिकांचे अतोनात नुकसान काढणीला आलेला गहू, कांदा यांसह डाळिंब, केळी, द्राक्षे, आंबा, टोमॅटो आणि झेंडू या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके जमिनीला टेकल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पंचनाम्यांचा ससेमिरा आणि प्रशासकीय गती १९ आणि २० मार्चच्या नुकसानीचा अहवाल प्रशासनाने वरिष्ठांकडे पाठवला असला, तरी सोमवारी झालेल्या ताज्या नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले नाहीत. प्रशासकीय सोपस्कार पूर्ण होऊन प्रत्यक्ष मदत हाती कधी पडणार, याकडे आता हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. जिल्ह्यात झालेले नुकसान { बाधित गावे: २०३ { बाधित शेतकरी: २१,५५६ { ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेले क्षेत्र: ८ हजार ६३४ हेक्टर { ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेले क्षेत्र: २ हजार २४४ हेक्टर { प्रमुख बाधित पिके: गहू, कांदा, डाळिंब, द्राक्षे, आंबा, टोमॅटो, झेंडू.
कारच्या धडकेत दुचाकी जळून खाक:कजगावजवळील घटना, धडकेनंतर दुचाकीने घेतला पेट; एक जखमी
भडगाव रस्त्यावरील कजगाव शिवारात सायंकाळी कार आणि दुचाकीचा अपघात झाला. या धडकेनंतर दुचाकीने पेट घेतल्याने ती संपूर्णतः जळून खाक झाली, तर या घटनेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. मालेगाव येथील चार प्रवासी आपल्या कारने (क्र. एम.एच. ०१ सी.एच. ४२६०) विवाह समारंभासाठी कासोद्याकडे जात होते. त्याचवेळी पाचोराकडून साकुरी (ता. मालेगाव) येथे जाणारी दुचाकी आणि कार यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीने जागीच पेट घेतला आणि काही वेळातच ति आगेत भस्मसात झाली. सुदैवाने, कारमधील 'एअरबॅग' वेळेवर उघडल्यामुळे त्यातील चारही प्रवासी सुखरूप बाहेर पडले. अपघातामुळे महामार्गावर धुराचे लोट पसरले होते, परिणामी दोन्ही बाजूची वाहतूक बंद पडली होती. घटनेची माहिती मिळताच कजगाव पोलिस मदत केंद्राचे हेड कॉन्स्टेबल किशोर सोनवणे, कजगावचे पोलिस पाटील राहुल पाटील आणि भोरटेकच्या पोलिस पाटील यांचे पती भाऊसाहेब उर्वरित.पान ४
येथील श्री समर्थ गोविंद महाराज विठ्ठल रखुमाई मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मंदिरात सात दिवसीय 'श्रीराम कथा' ज्ञानयज्ञासह ३५० वर्षांची प्राचीन पालखी सोहळ्याची परंपरा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी उत्राण सह परिसरातील शेकडो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांच्या जय श्री रामच्या जयघोषाने परिसर दुमदूूमुण गेला होता. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मंदिरात गेल्या सात दिवसांपासून रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. सातगाव डोंगरी येथील हभप ज्ञानेश्वर महाराज आपल्या रसाळ वाणीतून भाविकांना रामकथेचे श्रवण घडवत आहेत. प्रभू श्रीरामांचा आदर्श आणि त्यांचे जीवनकार्य यावर आधारित ही कथा ऐकण्यासाठी उत्राणसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. सामाजिक ऐक्याचे दर्शन या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील विविध समाजांना दिलेला मान. परंपरेनुसार, गावातील भोई समाज बांधवांना पालखी उचलण्याचा मान दिला जातो, तर पालखीच्या अग्रभागी मशाल धरण्याचा मान नाभिक समाजाला दिला जातो. हा उपक्रम गावातील सामाजिक सलोखा आणि एकतेचे प्रतीक मानला जातो. पालखी मिरवणुकीत टाळ-मृदंगाचा गजर मिरवणुकीदरम्यान मोठे झांज, टाळ आणि मृदंगांच्या गजरात अवघे मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. मंदिराच्या परंपरेनुसार यावेळी विविध अभंगांचे गायन करण्यात आले. या मंगलमयी सोहळ्यासाठी श्री रत्नाकर महाराज, शशिकांत महाराज, बाळू पाटील, पंकज पाटील, कैलास सोनवणे, नरेश पांडे यांच्यासह उत्राण गावातील सर्व ग्रामस्थ, महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
शहरातील सांस्कृतिक वातावरणाला नवी उभारी देणारा ‘चैत्र पालवी’ हा सुरेल कार्यक्रम उत्साहात पार पडला. आनंदयात्री परिवाराच्या वतीने आयोजित या मैफलीत स्थानिक कलावंतांनी सादर केलेल्या मराठी गीतांना रसिकांकडून भरभरून दाद मिळाली. कार्यक्रम जिल्हा परिषद मराठी शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. अध्यक्ष डॉ. अमोल सेठ आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विविध कवींच्या रचनांना सुरांची साथ देत कलाकारांनी वातावरण भारावून टाकले. या मैफलीत अमोल सेठ, चंद्रशेखर पाटील, गिरीश पाटील, विजय जोशी, स्वाती विसपुते, विजया पाटील, गार्गी चौधरी, मानसी शेळके, खुशी पांडे यांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांची मनं जिंकली. कार्यक्रमादरम्यान डॉ. नीलकंठ पाटील आणि शंकरराव पिंगळे यांनी मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले. निवेदनाची जबाबदारी गणेश राऊत आणि दीपाली सोनार यांनी समर्थपणे पार पाडली. रऊफ शेख आणि सागर थोरात यांनी हार्मोनियम व तबल्यावर साथ देत सादरीकरण अधिक रंगतदार केले. कार्यक्रमाच्या शेवटी सुहास चौधरी यांनी आभार मानले. स्टेज लाईटस् व बैठक व्यवस्थेसह उत्कृष्ट साउंडची जबाबदारी प्रशांत सैतवाल यांनी सांभाळली. ‘चैत्र पालवी’ या कार्यक्रमामुळे जामनेरमध्ये सांस्कृतिक चैतन्य निर्माण झाले असून, अशा उपक्रमांमुळे स्थानिक कलाकारांना उत्तम व्यासपीठ मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
चंडीकापूरला बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला:काही महिन्यांपासून परिसरात वावर
चंडीकापूर व परिसरात काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. दि. ३० मार्च रोजी रात्री ९. वाजेच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी सुरेश बागूल दुचाकीवरून जात असताना बिबट्याने हल्ला केला. ते दुचाकीवरून पडले. प्रसंगावधान राखत बिबट्याला पळविण्याचा प्रयत्न केला व मोठ्याने आवाज दिल्याने बिबट्या अंधारात पळून गेला. त्यांना वणी ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्या हाताला व खांद्यांला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक ज्योती झिरवाळ यांनी ग्रामिण रूग्णालयात येऊन जखमी बागूल यांची माहिती घेऊन वरिष्ठांना कळविली. बिबट्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले असून, यापूर्वी दोघांवर बिबट्याने हल्ला केला होता. यामुळे भीतीचे वातावरण आहे. आठ दिवसांपूर्वी महेश तिवारी हे रात्री शेतात पिकांना पाणी देत असताना बिबट्या समोर आला होता. हातातील बॅटरीचा प्रकाश त्याच्या डोळ्यावर मारल्याने ते हळूवार तेथून बाहेर पडले. दिवसा वीजपुरवठा खंडित होत असल्याने रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरावे लागत आहे. परिसरातील जनतेने अनेकदा ओरड करूनही वीज वितरण कंपणीकडून वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. प्रतिनिधी | इगतपुरी टिटोली येथील एका घरात चोरट्याने सुमारे ४ लाख ५७ हजार ५०० रुपयांचे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांत चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. इगतपुरी पोलिसांनी या गुन्ह्यात अबीशेख दारासिंह मोरे ( २९, रा. गोदावरी रो-बंगलो, मेरी लिंकरोड, नाशिक) या संशयित आरोपीचे नाव निष्पन्न झाल्याने त्याला अटक केली आहे. फिर्यादी कुंदा चंद्रकांत भोपे ( ५२, रा. टिटोली) हे बाहेरगावी गेले असताना ही घटना घडली. चोरट्याने घरातून हे सोने चोरून नेले. याबाबत त्यांनी माहिती समजताच तत्काळ इगतपुरी पोलिसांकडे फिर्याद दिली. घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करण्यात आले. पोलिसांनी संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.
मुंगसापूर (ता. कन्नड) येथील मुक्तानंदगिरी महाराज यांच्या आश्रमाच्या बाहेर पपई विक्री करतो म्हणून शेतकरी बबनराव जयवंतराव पवार (५९) यांना सोमवारी बेदम मारहाण झाली. त्यांना संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केले. बबनराव पवार यांनी सांगितले की, आश्रमात पपई विक्री करू नकोस, असे म्हणून मुक्तानंदगिरी महाराजांनी मज्जाव केला. नंतर आश्रमातील सात ते आठ लोकांनी मला उचलून महाराजांच्या केबिनमध्ये नेले. त्या ठिकाणी मुक्तानंदगिरी महाराज यांनी व इतरांनी मला मारहाण केली, अशी तक्रार जखमीने दिली. जखमीच्या जबाबानंतर संबंधितांवर गुन्हा नोंदवू , असे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात मुक्तानंदगिरी महाराज यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या वतीने संजय महाराज यांनी सांगितले की, बबनराव पवार हे येथे पपई विक्री करतात. त्याचा कचरा येथे होतो म्हणून त्यांना मज्जाव केला. पावसामुळे सीसीटीव्हीचे केबल तुटले आहेत. अन्यथा चित्रण मिळाले असते, असे ते म्हणाले.
कचनेर (ता.छत्रपती संभाजीनगर) येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिरात नागरिकांनी विविध योजनांचा एकाच छताखाली लाभ घेतला तसेच शिबिरांच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, तक्रारी आणि अडचणी तत्काळ निकाली निघाल्या यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, नेतृत्वाखाली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून महायुती सरकार जनतेच्या हितासाठी विविध लोककल्याणकारी योजना प्रभावी राबवण्यासाठी तसेच विविध प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार कचनेर येथे शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी पैठणचे आमदार विलास भुमरे म्हणाले, सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांसाठी योजना तसेच महसूलच्या १५ स्वरूपातील सेवा एकाच दिवसात मार्गी लागल्या याचा आनंद आहे. तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी शिबिरे होतील. त्या सर्व ठिकाणी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय घोडके, पंचायत समिती सदस्य अनुराग शिंदे यांनी प्रशासनाला काही सूचना केल्या. पंचायत समिती सभापती कल्याण गायकवाड यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक पवार, विजय घोडके, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब राठोड,शैलेश चौधरी, युवासेना तालुका प्रमुख मंगेश गावंडे, नायब तहसीलदार परेश चौधरी,उत्कर्षा पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी साळुंके, तालुका कृषी अधिकारी श्याम गुळवे, मंडळ अधिकारी अश्विनी सोनवणे, आरोग्य अधिकारी डॉ.नितीन पवार, डॉ.युसुफ मणियार, प्रकाश जाधव, मुकेश चव्हाण, अनिल मोरे, बुधसिंग जारवाल, गणेश बोंगाने आदींसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात या योजनांचा लाभ येथील शिबिरात महसूल विभागाने एकूण १५ पेक्षा जास्त प्रमुख योजनांचा लाभ दिला. यात प्रलंबित फेरफार, ७/१२ दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२, आणि नमुना ८-अ उतारा, उत्पन्न, रहिवासी, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, सामाजिक अर्थसाहाय्य योजनांचे लाभ, विद्यार्थ्यांसाठी दाखले, पाणंद रस्त्यांचे मान्यतेचे आदेश आदी योजनांची जनजागृती व लाभ देण्यात आले.
शासनाच्या ताब्यात असलेल्या गायरान जमिनी आता कागदोपत्रीच उरल्या असून प्रत्यक्षात त्या मुरूम माफियांच्या ताब्यात गेल्याचे खंडाळा परिसरात उघड चित्र आहे. तब्बल १५ गायरान ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून विना रॉयल्टी जेसीबीच्या साहाय्याने डोंगर पोखरले जात आहेत, तर ट्रॅक्टर-डंपरमधून मुरूमाची खुलेआम वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे इतका मोठा प्रकार सुरू असताना महसूल विभाग मात्र ‘अनभिज्ञ’ असल्याचे भासवत असल्याने हा प्रकार केवळ निष्क्रियता की संगनमत, असा सवाल उपस्थित होत आहे. खंडाळा परिसरात गायरान जमिनींची लूट सुरू असताना महसूल विभाग मात्र ‘झोपेचे सोंग’ घेत बसल्याचे चित्र आहे. जेसीबीने डोंगर पोखरले जात असताना आणि डंपरने मुरूमाची वाहतूक उघडपणे होत असताना प्रशासनाला हे दिसत नाही काॽ असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. इतका मोठा प्रकार सुरू असताना एकही ठोस कारवाई न होणे ही केवळ निष्क्रियता नसून कुणाच्या तरी आश्रयानेच हा धंदा सुरू असल्याची चर्चा रंगत आहे. शासनाच्या मालकीच्या जमिनीवर खुलेआम ‘खाजगी खाणी’ चालू असताना महसूल यंत्रणा नेमकी कोणाच्या सेवेत आहे, हा प्रश्न आता टोकदार झाला आहे. पुरावे दिले; तरीही कारवाई गायब... खुलेआम सुरू असलेल्या मुरूम उपशाच्या धंद्याविरोधात ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही स्थानिक महसूल प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट ‘आपले सरकार’ पोर्टलवर फोटो, व्हिडिओ आणि लेखी पुराव्यासह तक्रारी दाखल केल्या आहेत. कोणत्या वेळेस कोणत्या अधिकाऱ्याला अवेध मुरूम उपसा विषयी माहिती देण्यात आली, याचेही तपशील सादर करून स्थानिक प्रशासनावरच निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यात आला आहे. १५ गट, २४७ हेक्टर शासनाची जमीन धोक्यात... गट क्रमांक ५४, ५५, २०८, २१२, ५०८, ५८८, ५८९, ६३७ ते ६३९, ६६१, ६८७, ६८९ आणि ७०२ या एकूण १५ गटांमध्ये मिळून तब्बल २४७ हेक्टर शासनाची गायरान जमीन आहे. या सर्व जमिनीवर मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचे दिसत असून अनेक ठिकाणी जमिनीचा मूळ स्वरूपच नष्ट झाला आहे. पाहणी करून कारवाई करू ^खंडाळा येथील गायरान जमिनीतून अवैध मुरूम उपशाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित सर्व गायरान क्षेत्राची पाहणी करून ज्या ठिकाणी उत्खनन झाले आहे, त्या ठिकाणचे पंचनामे करण्याच्या सूचना तलाठीला दिल्या आहेत. मी स्वतःही लवकरच या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कारवाई करणार आहे. - सुनील सावंत, तहसीलदार, वैजापूर
पिंपळदरी येथील बसस्थानक रोडवर अर्धातास ट्रॅफिक जाम
छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर बाळापूर ते पिंपळदरी-अजिंठा लेणी ह्यु पाईट या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्यावर पिंपळदरी येथे मंगळवारी आठवडी बाजार भरतो. या दिवशी बेशिस्त वाहनचालक वाहने अस्ताव्यस्त पार्क करतात. रस्त्यालगत वाहने उभी राहतात. पादचाऱ्यांची पंचाईत होते. सुज्ञ वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. पिंपळदरी बसस्थानक रोडवर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अजिंठा लेणी ह्यु पाईटला जाण्यासाठी हा मार्ग असल्याने महामार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. पिंपळदरी बसस्थानक परिसरात ट्रॅफिक जामची समस्या गंभीर झाली आहे. मंगळवारी बाजाराच्या दिवशी गाड्या थेट रस्त्यावर उभ्या केल्या जातात. वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले जातात. त्यामुळे अनेकदा अर्धातास ट्रॅफिक जाम राहतो. परिसरात पार्किंगची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने याच मार्गावरून येतात. स्थानिक नागरिकांना उद्योग, व्यवसाय, शाळा, नोकरी, रुग्णालय, महाविद्यालयासाठी याच रस्त्याने जावे लागते. कामगार वर्गालाही याच मार्गावरून प्रवास करावा लागतो. वाहन लावताना शिस्त पाळली जात नाही. त्यामुळे वाहनचालक, स्थानिक नागरिक त्रस्त आहेत.
खंडाळ्यातील आगग्रस्त कुटुंबाला जिल्हा परिषद सदस्यांकडून संसार उपयोगी वस्तूंसह आर्थिक मदत
वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील शिवाजी कारभारी सोनवणे हे गट नं. ५८९ मधील शासकीय गायरानात झोपडीत राहतात. २८ मार्च शुक्रवार रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान अचान झोपडीला आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मदतीस धावले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत घरातील अन्नधान्य, कपडे पूर्णपणे जळाले तर शिवाजी सोनवणे यांचे चार मुले व सुना चार दिवसांपूर्वी गंगानगर साखर कारखान्यावरून घरी परतली होती. साथीदारांचे मजुरीचे पैसे वाटप करुन उर्वरित २ लाख २२ हजार ७०० रुपये झोपडीत ठेवलेली रक्कमही या आगीत खाक झाली. या घटनेमुळे सदरील आदिवासी कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला असल्याने जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी ३१ मार्च मंगळवार रोजी सकाळी घटनेच्या ठिकाणी भेट देत संपूर्ण घटनाक्रम जाणून घेत कुटुंबाचे सांत्वन करून संसार उपयोगी वस्तू, एक महिना पुरेल एवढा किराणा साहीत्य व अंगावरील कपड्याची भेट देऊन मदत केली तसेच शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देणार असल्याचे आश्वासन देखील देण्यात आले. याप्रसंगी माजी उपसरपंच विजय मगर,विजय शिंदे,माजी सरपंच गोरखनाथ शिंदे, संतोष जाधव, अर्जुन मगर, सुभाष पवार, साजिद खान, ताराचंद वेळंजकर, राजेंद्र जानराव, महेश जाधव, मुकेश पवार, राजेंद्र आंबेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
वसईत माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली. वडिलांशी झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून संदीप पवार नराधम रिक्षाचालकाने ३० मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास साडेतीन वर्षांच्या विघ्नेश अतुल कोंढारे या निष्पाप चिमुरड्याला चार फूट उचलून जमिनीवर आपटले. त्याचे डोके भिंतीवर आदळले. जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. सध्या विघ्नेश मृत्युशी झुंज देत आहे. संतापजनक म्हणजे, गंभीर स्थितीतील या मुलाला वसईतील चार रुग्णालयांनी उपचार नाकारले. म्हणून त्याला मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तो व्हेंटिलेटरवर आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ३१ मार्च रोजी अटक केली आहे. जखमी अवस्थेत पहिल्या मजल्यावर फरफटत नेले मनाचा थरकाप उडवणारी ही घटना वसईतील अनुपम घर संकुल सोसायटीत घडली. आरोपी संदीप आणि विघ्नेशचे वडील अतुल कोंढारेंत जुना वाद होता. ३० मार्च रोजी सकाळीही त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. सायंकाळी जेव्हा विघ्नेश सोसायटीच्या आवारात खेळत होता, तेव्हा संदीपने काही कळायच्या आत त्याला हवेत उचलून जमिनीवर आपटले. त्यात त्याचे डोके ठेचले गेले आणि तो वेदनेने व्याकूळ होऊन टाहो फोडू लागला. पण संदीपचे समाधान झाले नाही. त्याने त्याला फरफटत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नेले आणि तिथे पुन्हा भिंतीवर आदळले. विघ्नेशच्या आजीने आरडाओरडा करत धाव घेतल्यामुळे त्याचे प्राण वाचले. प्रत्यक्षदर्शी कल्पेश पाटील म्हणाले की, संदीपने विघ्नेशला रिक्षामधून बाहेर काढून जमिनीवर आपटले. विंगमध्ये नेऊन मारहाण केली. विघ्नेश सध्या व्हेंटिलेटरवर आहे. संदीपची विकृती बघून संपूर्ण सोसायटीत दहशत पसरली आहे. अशा रुग्णालयांविरुद्ध करता येते तीन ठिकाणी तक्रार कोणत्याही रुग्णालयाने उपचार नाकारल्यास १००/११२ नंबरवर कॉल करून पोलिसांना कळवा. संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी तक्रार करता येते. सेवेतील त्रुटीसाठी रुग्णालयाविरुद्ध ग्राहक न्यायालयात दाद मागता येते. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे संबंधित डॉक्टरांविरुद्ध निष्काळजीपणाची तक्रार नोंदवता येते.
एसआयटी पथकाने लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेतील भोंदू अशोक खरातच्या कर्मयोगीनगर येथील ‘तृप्तबाला’ बंगल्यात १५ मिनिटे सर्च ऑपरेशन राबवले. खरातचा मुलगा हर्षवर्धनला ताब्यात घेतले. खरातची पत्नी मात्र फरार झाली. पोलिस येणार असल्याची कुणकुण लागताच घरातील सर्व लाइट बंद करून खरातचा मुलगा लपला होता. पथकाने शेजारच्या बंगल्यातून खरातच्या बंगल्यात प्रवेश करत हर्षवर्धनला ताब्यात घेतले. या प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये त्याचा नेमका सहभाग काय, याची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, खरातच्या वैद्यकीय उपचार, आर्थिक व्यवहारात संशयावरून नाशिकमधील तीन बड्या डॉक्टरांची एसआयटीने चौकशी केली. या मुद्द्यावर झाली डॉक्टरांची चौकशी या डॉक्टरांनी खरातच्या व्यवसायात आर्थिक गुंतवणूक केली आहे का? वैद्यकीय क्षेत्राच्या आड ते अवैध व्यवसाय करत होते का? संबंधित डॉक्टरांचा खरातकडून ‘कव्हर’ म्हणून वापर केला जात होता का? हायप्रोफाइल भक्तांची साखळी नेमकी कशाकरिता तयार केली होती? या मुद्द्यांच्या तपासाकरिता चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. खरात टोळीतील दोघे अटकेत शिर्डी | भोंदू खरातने शिर्डीतील गोंदकर कुटुंबीयांची ४ एकर जमीन हडपल्याची तक्रार सोमवारी करण्यात आली होती. मंगळवारी या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी खरात व त्याच्या पत्नीसह पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र सावकारी नियमन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून किरण सोनवणे व अरविंद बावके यांना अटक करण्यात आली. खरातच्या सीएची पुण्यात १०० कोटींची मालमत्ता पुणे | खरातचा सीए ललित प्रकाश पोफळे यांच्या कुटुंबीयांची पुण्यातील कोरेगाव पार्क येथे सुमारे १०० कोटींची जमीन असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या तक्रारीत केला आहे. सार्वजनिक ट्रस्टच्या या जमिनीचा १९८७ मधील व्यवहार २०२४ मध्ये कन्फर्म झाला. सुमारे १०० कोटींची मालमत्ता कागदावर फक्त १९.५६ कोटींची दाखवण्यात आल्याचे कुंभार यांचे म्हणणे आहे. माझ्या आमदारकीमध्ये खरातच्या संस्थेला मंत्र्यामुळे पाणी- कोकाटे दरम्यान, भाजपचे नेते उदय सांगळे म्हणाले की, माजी मंत्री माणिकराव कोकाटेंनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासून अनेक अघोरी पूजा केल्या. सिन्नरला आठ-आठ दिवस पाणी येत नसताना दारणा नदीतून ३९ लाख लिटर पाणी परवाना कोकाटे आमदार असतानाच खरातला मिळाला. त्यावर कोकाटे म्हणाले की, मी आमदार असताना खरातच्या संस्थेला पाणी मंजुरी मिळाली. पण ती तत्कालीन मंत्र्यांनी दिली होती. यात माझे एखादे शिफारस पत्र दाखवावे. गावासाठी मंजूर पाण्याची टाकी मंदिराच्या परिसरात जि.प. निधीतून तत्कालीन अध्यक्षांच्या कार्यकाळात झाली. सिन्नरचे नगराध्यक्ष विठ्ठल उगले, नगरसेवक ॲड. पंकज जाधव म्हणाले की, सांगळेंनीच खरातांना पाठबळ दिले. चौकशीनंतर सांगळेंनाच सहआरोपी करावे.
राज्यात सध्या हवामानाचा दुहेरी खेळ पाहायला मिळत आहे. एका बाजूला नाशिक आणि पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, तर दुसरीकडे मालेगाव, अकोल्यासह अनेक जिल्ह्यांत उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. नाशिकमध्ये कमाल तापमानात १ ते ५ अंशांची घसरण होऊन ते ३४.२ अंशांवर आले आहे, तर मालेगावमध्ये राज्यातील सर्वाधिक ३८.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला : गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अवकाळीचे सावट आहे. सोमवारी देवळा, बागलाण, निफाड, दिंडोरी आणि सिन्नर तालुक्यांत गारपीट झाली. तर मंगळवारी सिन्नरच्या चास आणि पाटोळे गावांत जोरदार पाऊस झाला. सिन्नरच्या चास येथील शेतकरी नामदेव शिंदे (बदललेले नाव) आपली व्यथा मांडताना म्हणाले, ”दोन दिवसांपूर्वीच कांदा काढणीला सुरुवात केली होती. पण अचानक आलेल्या पावसात सगळा कांदा भिजला. वर्षभराची मेहनत एका रात्रीत मातीत मिसळली आहे.” राज्यात ३ एप्रिलपर्यंत १३ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. एप्रिल-जूनपर्यंत कमाल तापमानाचा आऊटलुक महाराष्ट्र आणि तेलंगणाव्यतिरिक्त देशाच्या इतर भागांत रात्रीचे तापमान सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता. ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे हवामान विभागाने राज्याला सतर्कतेचा इशारा दिला असून ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, लातूर, धाराशिव आणि यवतमाळ. (येथे वादळी वाऱ्यासह गारपिटीची दाट शक्यता) या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तापमान... पुढील 3 महिने दिवसाचा पारा कमी राहण्याची शक्यता आयएमडीने पुढील ३ महिन्यांच्या अंदाजात म्हटले आहे की, एप्रिल ते जूनपर्यंत पूर्व आणि ईशान्य भाग वगळता देशात दिवसाचे तापमान सातत्याने सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी राहील.
“स्वराज्यरक्षिका महाराणी ताराबाई या जैनधर्मीय होत्या,’ असा खळबळजनक दावा जैन मुनी नयन पद्मसागर यांनी केला. महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतरच्या कठीण काळात एका जैन राणीचा उदय झाला. त्या म्हणजे ताराबाई. त्यांनी युद्धाची धुरा सांभाळली आणि औरंगजेबाला धूळ चारली. हा वीरांचा इतिहास जैन महिलांचा इतिहास आहे. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना आणि पहिला फिल्म स्टुडिओ जैन व्यक्तीनेच सुरू केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. दोनपेक्षा जास्त मुले असणाऱ्या कुटुंबाच्या सर्व सरकारी सुविधा बंद करा. त्यांचा मतदानाचा अधिकारही तातडीने काढून घ्यावा, अशीही मागणी त्यांनी केली. काही काळापूर्वी नयन पद्मसागर यांनी “पाटील, चौगुले, खोद, सरनाईक हे सर्व जैन धर्म पाळतात आणि खरे मराठी हे जैनच आहेत,’ असे वक्तव्य केले होते. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या ताराराणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले की, “महाराणी ताराबाई या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी अशी धादांत खोटी आणि वादग्रस्त विधाने करून समाजाची दिशाभूल करू नये. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगरमध्ये सुरू केला. ते जैन नव्हते. कोल्हापूर किंवा प्रभात फिल्म कंपनीशी काही जैन व्यक्तींचा संबंध असला तरी पहिला फिल्म स्टुडिओ किंवा सिनेसृष्टीचा पाया रचण्याचे श्रेय दादासाहेब फाळकेंकडेच जाते.’
शिवसेनेतील उफाळून आलेल्या अंतर्गत वादामुळे जिल्ह्याची स्थानिक निर्णय प्रक्रिया पूर्णपणे कोलमडली आहे. स्थायी समिती सदस्य निवड असो वा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती. आता प्रत्येक फाइलसाठी स्थानिक नेत्यांना मुंबईच्या ‘ग्रीन सिग्नल’ ची प्रतीक्षा करावी लागत आहे. गटबाजीचा फटका निवडणुकीत बसल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने पक्षाने संघटनात्मक बदलांचे संकेत दिले होते. या साऱ्या घडामोडींचा थेट परिणाम आता निर्णयक्षमतेवर झाला आहे. स्थानिक पातळीवर कोणताही मोठा निर्णय घेण्याचे धाडस नेते दाखवत नसल्याचे चित्र आहे. बदललेले सत्तेचे केंद्र : एरवी जिल्ह्याचे सर्व धागेदोरे स्थानिक पालकमंत्री किंवा जिल्हाप्रमुखांच्या हाती असायचे. मात्र, गेल्या काही महिन्यांतील वादांमुळे आता थेट मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरच निर्णयांवर शिक्कामोर्तब होत आहे. “संघटना मजबूत करण्यासाठी आणि तांत्रिक चुका टाळण्यासाठी हा बदल केला आहे,’ असे समर्थन जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केले आहे. दरम्यान, संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी स्पष्ट केले आहे की, तांत्रिक कारणास्तव नामुष्की टाळण्यासाठीच स्वीकृत नगरसेवकांचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे. नामुष्की टाळण्यासाठी ‘वेट अँड वॉच’ स्वीकृत नगरसेवक पदासाठी ज्या नावांची चर्चा आहे, त्यांच्या अर्जात तांत्रिक त्रुटी निघाल्यास पक्षाची छी-थू होऊ शकते. यापूर्वी अशा घटनांमुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले होते. म्हणूनच, जोपर्यंत अर्जांची छाननी पूर्ण होत नाही, तोपर्यंत अधिकृत घोषणा न करण्याचे आदेश थेट ‘वरून’ आले आहेत. विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह? स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रिया मुंबईला स्थलांतरित झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. प्रत्येक निर्णयासाठी मुंबईवारी करावी लागत आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाची पकड ढिली होत असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही ‘केंद्रीकृत’ पद्धत फायद्याची ठरते की अंतर्गत बंडाळी वाढवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विस्कळीत निर्णय प्रक्रियेचे ३ मुद्दे
तायडे कुटुंबीयांच्या महार वतन जमीन प्रकरणात दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा हा पूर्णपणे राजकीय षड्यंत्र असून, केवळ मला छळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पोलिसांवर दबाव आणला आहे, असा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केला. या अन्यायाविरुद्ध आणि खोटा गुन्हा रद्द करण्यासाठी आपण औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जळगावातील मुक्ताई निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जमीन वर्ग १ ची आहे. तरी त्यावर २३-२४ वर्षांनंतर २९ पैकी एकाच जमीनधारकांची तक्रार का?, चौकशीशिवाय गुन्हा दाखल का?, असा सवालही खडसेंनी केला. खडसेंना अटक केली तरच सत्य बाहेर येईल- रिपाइं तापी पूर्णा कारखान्याच्या नावाखाली महार वतन जमीन बळकावल्या प्रकरणात नि:पक्ष चौकशीसाठी एसआयटी नेमून आमदार एकनाथ खडसे यांना तत्काळ अटक करावी, त्यानंतर सत्य समोर येईल, अशी मागणी रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केली.
मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘महिला राज’ अवतरले असले तरी या नियुक्तीमागे सत्तासंघर्षाचा एक मोठा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ रंगला. ७४ हजार कोटींचे वार्षिक बजेट असलेल्या मुंबई महापालिकेचा ‘रिमोट कंट्रोल’ आपल्याच हाती असावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रस्सीखेच झाली. अखेर नगरविकास विभाग असूनही शिंदेंना माघार घ्यावी लागली आणि फडणवीसांच्या निकटवर्तीय अश्विनी भिडे यांनीच आयुक्तपद काबीज केले. या नियुक्तीने ७४ हजार कोटींच्या मनपाच्या तिजोरीवर मुख्यमंत्र्यांची पकड अधिक मजबुत झाली आहे. ‘वर्षा’वर जोरदार रस्सीखेच; शिंदेंचा नगरविकासचा दावा फेटाळत नियुक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या विश्वासातील वरिष्ठ आयएएस अधिकारी असीम गुप्ता यांच्यासाठी आग्रही होते. “नगरविकास विभाग माझ्याकडे आहे, त्यामुळे मुंबईचा आयुक्त माझ्या मर्जीतील असावा,’ असा थेट दावा शिंदेंनी केला होता. मात्र, फडणवीसांनी भिडे यांच्या नावाचा अट्टाहास धरला. ३० मार्च रोजी ‘वर्षा’ बंगल्यावर यावरून दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली. मुंबईला महिलांसाठी अधिक सुरक्षित बनवणार “मुंबईला महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि सुलभ बनवणे हे माझे प्राधान्य असेल. लोकप्रतिनिधींसोबत काम करण्याचा अनुभव पाठीशी असल्याने प्रशासन अधिक वेगाने धावेल.” - अश्विनी भिडे, आयुक्त, मुंबई महानगरपालिका
महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि फसवणूक प्रकरणातील संशयित अशोक खरात याच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक शहरालगत पार पडलेल्या विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत राज्यातील दिग्गज राजकीय नेत्यांची नावे ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून छापण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खरातच्या मुलीचा विवाह सोहळा १० जानेवारी २०२६ रोजी नाशिकमधील रिसॉर्टवर पार पडला. या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर, मिलिंद नार्वेकर आणि आमदार दीपक केसरकर यांची नावे झळकली आहेत. आयटीसह सीजीएसटी, ईडीकडून खरात प्रकरणाची स्वतंत्र चौकशी खरात याच्यासह त्याच्या कुटुंबीयांच्या नावे नाशिकसह पुणे, रायगड, अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या कंपन्या, बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसायात त्याने जीएसटी देखील बुडवला असल्याचा संशय आहे. त्या दिशेनेदेखील केंद्र व राज्य जीएसटी पथकाकडून चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या दोन्ही यंत्रणांपाठोपाठ ईडीनेही संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. पुढे काय? - फौजदारी कारवाईसह अटकेची शक्यता आयकर व सेंट्रल जीएसटीतील कायदेशीर तरतुदींनुसार, करचुकवेगिरी सिद्ध झाल्यास खरात व कुटुंबीयांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल होऊन तीन वर्षांपासून ते १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व २०० टक्क्यांपर्यंत दंडात्मक कारवाई होऊ शकते, असे निवृत्त आयकर अधिकाऱ्याने सांगितले. आधी ऑफिसबॉयविरुद्ध तक्रार, नंतर खरातच अडकला २९ डिसेंबर २०२५ रोजी वावी पोलिस ठाण्यात खरातने खंडणीची तक्रार दिली होती. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी शिर्डी पोलिस ठाण्यात ऑफिस बॉयविरोधात ब्लॅकमेलिंग आणि अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर १७ मार्च २०२६ रोजी सरकारवाडा पोलिस ठाण्यात खरातविरोधात गुन्हा दाखल झाला. स्पाय कॅमेऱ्याची बाब ऑफिस बॉयच्या मित्रालाही माहिती खरात बसत असलेल्या खुर्चीच्या मागील बाजुच्या कोपऱ्याजवळ मित्राच्या मदतीने त्याने बारीक स्पाय कॅमेरा लावला. २०२३ ते २०२५ या कालावधीतील सर्व ‘ॲक्सेस’ त्याने मोबाइलमध्ये घेतला. खरात महिलांना काहीतरी खाण्यास-पिण्यास देत असे आणि डोक्यावर ग्लास ठेवण्यास सांगून पाठीमागून मिठी मारत शारीरिक संबंध प्रस्थापित करताना दिसला. भीतीपोटी सुरुवातीला कोणी तक्रार दिली नाही. शिर्डीमध्ये एका तरुणीने तक्रार दिल्यानंतर खरातने संबंधित तरुणाकडे व्हिडिओ मागितले; पत्नी व मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. पण त्याने पेनड्राइव्हमध्ये व्हिडिओ जतन केले. २०० कोटी रुपयांची संपत्ती, मात्र कागदावर १२ लाखांचे उत्पन्न भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात याच्या पापाचा घडा आता भरत चालला आहे. पोलीस तपासानंतर आता खरातच्या आर्थिक साम्राज्याची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. नाशिकसह राज्यभरात खरातची तब्बल २०० कोटींहून अधिकची मालमत्ता असल्याचे समोर येत असताना त्याने आयकर विभागाला सादर केलेल्या आयटीआरमध्ये स्वतःचे उत्पन्न केवळ १२ लाख रुपयेच दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे खरातच्या या मंत्रतंत्राच्या विळख्यात खुद्द याच आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारीदेखील ‘आंधळे’ होऊन नियमित दरबारात हजेरी लावत होते. त्यांच्याच मदतीने त्याने शासनाची कोट्यवधींची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. राजकीय वरदहस्ताची चर्चा एकीकडे कॅप्टन खरात यांच्यावर महिलांचे लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप असताना, दुसरीकडे त्यांच्या घरच्या कार्यक्रमात राज्याच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या नेत्यांची नावे असणे, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भोंदू खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत एकनाथ शिंदेंचे नाव खरातच्या ‘ओकस’ कार्यालयातील बंद दरवाजाआड सुरू असलेल्या काळ्या कारनाम्याला ऑफिस बॉयनेच तांत्रिक सुरुंग लावला. आपल्याच पत्नीवर खरातने अत्याचार केल्याचे कळताच बदला घेण्यासाठी त्याने खरातच्या कार्यालयात छुपे कॅमेरे बसवून खरातचे बिंग फोडले. याच कॅमेऱ्यातील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची शहर पोलिसांनी दखल घेत अत्यंत गोपनीय ऑपरेशन राबवून या भोंदूला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. ऑफिस बॉयने कॅमेरा लावत कसा भंडाफोड केला याचा हा ‘ग्राउंड रिपोर्ट’. ओकस कार्यालयात अनेक महिलांचे मन आणि शरीर शुद्ध करण्याच्या नावाखाली खरात शोषण करायचा. त्याच्या भक्तांमध्ये अनेक बडे राजकारणी, पोलिस अधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे कोणीही त्याच्याविरोधात तोंड उघडत नव्हते. सूड घेण्यासाठी हेरगिरी संबंधित ऑफिस बॉय २०१९ पासून खरातकडे ८ हजार रुपये महिना पगारावर कामाला होता. खरात अंकशास्त्र, मंत्र-तंत्र व भविष्य सांगत असल्याने तिथे शेकडो भक्तांची रेलचेल असे. अपॉइंटमेंट देणे, बोटांच्या अंगठीचे माप घेणे, खडे आणणे, ऑफिस उघडणे-बंद करणे, साफसफाई अशी कामे तो करायचा. खरात या पती-पत्नीला बोलावून घेत असे आणि पतीला बाहेर पाठवून आत विधी करत असे. २०२३ मध्ये ऑफिस बॉय गरोदर पत्नीला आशीर्वाद घेण्याकरिता खरातकडे घेऊन आला होता. बाळासाठी विधी करण्याचे सांगून खरातने त्याच्या पत्नीवर अत्याचार केला. ही बाब सांगितल्यावर ऑफिस बॉयला विश्वास बसेना, म्हणून पत्नीने पोटातील बाळाची शपथ घेतली. तेव्हा त्याने ‘बाबा’ला धडा शिकवण्याचे ठरवले.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात फळबागांना फटका
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी तालुक्यात झालेल्या अचानक वादळी वा-यामुळे फळबागांना मोठा फटका बसला आहे. जोरदार वा-यामुळे आंबा, डाळिंब यांसारख्या फळबागांतील अनेक ठिकाणी फळांची मोठ्याा प्रमाणात गळ झाली आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: आंबा बागांमध्ये काढणीपूर्वीच फळे गळून पडल्याने शेतक-यांची आर्थिक गणिते विस्कळीत झाली आहेत. डाळिंब बागांनाही मोठा फटका बसला असून […] The post शिरूर अनंतपाळ तालुक्यात फळबागांना फटका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सरकार आणि समाज यांनी सामूहिकपणे समस्यांचा सामना केल्यास त्या लवकर सोडवणे शक्य होते. अन्यथा अनेक समस्या दीर्घकाळापासून समाजाच्या मानगुटीवर ठाण मांडून राहतात. दीर्घकाळापासून भेडसावणारी समस्या कायमची सोडवणे शक्य नाही ही देखील एक समस्याच आहे. तिचे उत्तर माहीत असूनही त्यावरचा कायमस्वरूपी उपाय शक्य होत नाही. याचे कारणही समस्येतच दडलेले असते. आज समस्यांचा इतका मोठा डोंगर उभा […] The post समस्यांचा डोंगर! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. सर्वत्र अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवला जात असतानाच, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून असलेल्या माझ्या घशाच्या समस्येवर औषधांनी काहीही फरक पडला नाही, मात्र गुरुजीदेवजींच्या आशीर्वादामुळे आज मी स्पष्ट बोलू शकत आहे, असा दावा महापौरांनी केला आहे. महावीर जयंती निमित्त बोरोवली कोरा केंद्र मैदानात भगवान महावीर जन्म कल्याणक मोहत्सव साजरा होत आहे. या महोत्सवात महापौर रितू तावडे बोलत होत्या. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी गुरुजीदेवजींच्या 'चमत्कारा'चा अनुभव कथन केला. त्या म्हणाल्या, दीड वर्षांपासून मला घशाचा तीव्र त्रास होता. मी अनेक औषधे घेतली, उपचार केले, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी मी गुरुजींना या आवाजाच्या समस्येबद्दल सांगितले. त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि आज तुम्ही पाहताय की मी तुमच्यासमोर स्पष्टपणे बोलू शकत आहे. माझ्यासाठी हा एक मोठा चमत्कार असून, आज मला एक सकारात्मक ऊर्जा जाणवत आहे. मंत्री लोढांकडूनही 'चमत्कारा'चा उल्लेख महापौर रितू तावडे यांच्या या विधानानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील गुरुदेवजींच्या चमत्काराचा उल्लेख केला. गुरुदेवजींची भेट घेतल्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या आशीर्वादामुळेच रितू तावडे मुंबईच्या महापौर होऊ शकल्या, असे विधान लोढा यांनी केले. यामुळे महापौरांच्या पदाला केवळ राजकीय नव्हे, तर आध्यात्मिक अधिष्ठान असल्याचे लोढा यांनी सुचवल्याची चर्चा रंगली आहे. 'भोंदूगिरी'च्या वादात महापौरांचे विधान चर्चेत सध्या राज्यात अशोक खरात या भोंदू बाबाने केलेल्या लैंगिक शोषणाचे आणि फसवणुकीचे प्रकरण गाजत आहे. सर्वच स्तरातून बुवाबाजी आणि अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले जात असताना, देशाच्या आर्थिक राजधानीच्या प्रथम नागरिकाने जाहीरपणे 'चमत्कारा'ची भाषा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका बाजूला सरकार अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदे करत असताना, दुसरीकडे जबाबदार पदावरील व्यक्तींकडून 'चमत्कारा'चे जाहीर समर्थन झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबईच्या महापौरांनी आजाराचे निवारण चमत्काराने झाल्याचे सांगितल्याने विरोधक आता यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… भोंदू खरातची SIT कडून 5 तास चौकशी:महिला, नेते, सर्वसामान्यांसाठी 4 वेगवेगळे नंबर; महिलांना दिवस जाऊ नये म्हणून घेत होता काळजी भोंदू अशोक खरातकडे एक नव्हे तर तब्बल 4 मोबाईल क्रमांक असल्याची बाब समोर आली आहे. हे चारही नंबर तो वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी वापरत होता. विशेषतः खरातने आपल्या जाळ्यात नाशिकमधील नामवंत डॉक्टरलाही ओढले होते. त्यांच्या मदतीने तो आपल्या जाळ्यात अडकणाऱ्या महिलांना गर्भपाताची औषधे देत असल्याचा संशय आहे. त्यामुळे हे डॉक्टरही आता चौकशीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…
आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनची २५०० दिवसांची अखंड सेवा!
लातूर : प्रतिनिधी लातूर दुष्काळाने जखम झालेलं शहर. पाण्यासाठी रेल्वे धावली, आणि त्या घटनेने लातूरच्या नावावर एक वेदनादायक कलंक उमटला. कोरडं आभाळ, पाण्याची टंचाई, शेतक-यांची हलाखीची परिस्थिती हळूहळू हे शहर ‘मागास’म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पण या सगळ्या अंधारात काही तरुणांच्या डोळ्यात एक वेगळंच स्वप्न होतं लातूरला पुन्हा जिवंत करण्याचं, हरित, स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचं, आणि […] The post आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनची २५०० दिवसांची अखंड सेवा! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बहुचर्चित ब्रिकयार्ड स्पोर्ट क्लबवर सशस्त्र दरोडा
लातूर : प्रतिनिधी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहणा-या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कासारसिरशी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत निलंगा तालुक्यातील तांबाळा येथे परप्रांतीयांकडून चालविण्यात येत असलेल्या ब्रिकयार्ड स्पोर्ट क्लब (जुगार) वर काल रात्री अज्ञातांनी दरोडा टाकून बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला. क्लबमध्ये जुगार खेळणारे व कर्मचारी यांना जखमी केल्याचा प्रकार घडला असून या दरोड्याच्या थरारामुळे तांबाळा व […] The post बहुचर्चित ब्रिकयार्ड स्पोर्ट क्लबवर सशस्त्र दरोडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकरभरती प्रक्रियेवर तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग यांनी दिले आहेत. याबाबतचे अधिकृत पत्र ३० मार्च २०२६ रोजी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. कोरेगाव तालुक्यातील कण्हेर खेड येथील श्रीमंत महादजी शिंदे शेतकरी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. राज्य शासनाच्या अधिकृत यादीवरील मान्यता नसलेल्या एजन्सीला नोकर भरतीचे काम दिलेले आहे ते बंद करावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांपासून सहकार आयुक्त यांच्यापर्यंत केली होती. या मागणीवर वरूनच ही नोकर भरती स्थगित करण्यात आल्याचे समजते. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग तसेच सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (याचिका क्र. १६९१) प्रलंबित असून, अंतिम निर्णय होईपर्यंत भरती प्रक्रिया थांबविण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. प्रतिक्षित उमेदवारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण सदर भरती प्रक्रिया २०२४ मध्ये ‘वर्कवेल इन्फोटेक प्रा. लि.’ या एजन्सीमार्फत राबविण्यात आली होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ही भरती तात्काळ स्थगित करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, या आदेशाची अंमलबजावणी करून त्याचा अनुपालन अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्याची प्रत कोल्हापूर येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयालाही पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे भरती प्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने हायकोर्टात गेलो - किशोर शिंदे दरम्यान श्रीमंत महाजी शिंदे शेतकरी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी यासंदर्भात सांगितले की, आमच्या संस्थेच्या वतीने यासंदर्भात सातारा जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे चेअरमन नितीन काका पाटील व इतरांच्याकडेही या संस्थेकडून भरती करू नये या संदर्भात तक्रारी अर्ज दिले होते. परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने आम्ही उच्च न्यायालयात यासंदर्भात गेलो आहोत. म्हणूनच आता सहकार खात्याला हे पाऊल उचलावे लागले आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांत पाणी साठा ६० टक्क्यांवर
लातूर : प्रतिनिधी दुष्काळी जिल्हा अशी ओळख असलेल्या लातूर जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील प्रकल्पांत ब-यापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात १४४ प्रकल्पांतील पाणीसाठा अजूनही ६० टक्क्यांवर आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणा-या लातूकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुरेशा पाणीसाठ्यामुळे यंदा पाणीटंचाई होण्याची शक्यता जवळपास नाही. जिल्ह्यात १४४ प्रकल्पांचा […] The post जिल्ह्यातील प्रकल्पांत पाणी साठा ६० टक्क्यांवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नगरसेविकांच्या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद
लातूर : प्रतिनिधी भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या लातूर शाखेच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेविकासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेस १९ नगरसेविका उपस्थित होत्या. या प्रसंगी महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करत असताना महापालिकेच्या बजेटचा अभ्यास करून विकास कामाची मागणी पाहिजे, असे मत ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. अर्चना आपटे यांनी प्रेरणा गीत […] The post नगरसेविकांच्या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी आता आपला मोर्चा त्याच्या कुटुंबीयांकडे वळवला आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेली खरातची पत्नी कल्पना खरात हिचा शोध घेण्यासाठी गेलेल्या नाशिक पोलिसांनी, ती मिळून न आल्याने अखेर खरातच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे खरात टोळीच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू केला आहे. अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी आणि अटकेच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी नाशिक पोलिसांचे एक पथक खरातच्या निवासस्थानी गेले होते. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच कल्पना खरात फरार झाल्याची माहिती समोर आली. यावेळी घरात असलेल्या खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशीसाठी महाराष्ट्र पोलीस अकादमीत आणले आहे. याच ठिकाणी एसआयटी (SIT) कडून अशोक खरातची कसून चौकशी सुरू असून, आता बाप-लेकाची समोरासमोर बसवून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. शिर्डीत जमीन बळकावल्याचा गुन्हा; पत्नी आरोपी केवळ अंधश्रद्धाच नाही, तर जमिनी बळकावण्यातही अशोक खरातचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिर्डीतील ४ एकर भूखंडाच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना, मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे आणि अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रावसाहेब गोंदकर या शेतकऱ्याला व्याजाने पैसे देऊन, सावकारी पाशात ओढून त्याची जमीन बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. अटकेच्या भीतीने खरातची पत्नी कल्पना फरार झाली आहे. नाशिक आणि शिर्डीत शोधमोहीम तीव्र कल्पना खरात यांनी पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर आता त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांची दोन पथके नाशिक आणि शिर्डीच्या दिशेने रवाना झाली आहेत. आरोपींच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकले जात असून, लवकरच त्यांना बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. तपासाला वेग, नवे खुलासे होण्याची शक्यता अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आता त्याच्या मुलालाही ताब्यात घेतल्याने या फसवणुकीच्या जाळ्यात कुटुंबातील इतर सदस्यांचा किती सहभाग होता, हे स्पष्ट होणार आहे. जमिनीचे व्यवहार, आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीच्या माध्यमातून जमवलेली मालमत्ता या सर्व अंगांनी पोलीस सध्या तपास करत आहेत.
ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांनी मावळते महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार आज (दिनांक ३१ मार्च २०२६) सायंकाळी स्वीकारला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी विराजमान होणाऱ्या भिडे या पहिल्या महिला सनदी अधिकारी आहेत. अश्विनी भिडे या भारतीय सनदी सेवेतील १९९५ च्या तुकडीतील अधिकारी असून त्यांना सनदी सेवेचा सुमारे ३१ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात विविध महत्त्वपूर्ण पदांचा कार्यभार सांभाळला आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त, महाराष्ट्र शासनामध्ये सह सचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एम.एम.आर.डी.ए.) अतिरिक्त महानगर आयुक्त, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव, माननीय मुख्यमंत्री यांच्या अपर मुख्य सचिव म्हणून श्रीमती आश्विनी भिडे यांनी काम पाहिले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. आश्विनी भिडे यांनी यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेत दिनांक ९ मे २०२० ते दिनांक १९ मार्च २०२४ या कालावधीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) या पदावर कार्य केले आहे. मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या पूर्णत्वामध्ये देखील भिडे यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. दरम्यान, विविध ठिकाणी विविध पदांवर असताना केलेल्या उल्लेखनीय कार्यांबद्दल त्यांना विविध संस्था-संघटनांकडून पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शिंदेंचा विरोध मावळला; रात्रीच्या बैठकीत तोडगा सुरुवातीला अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीला नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, सोमवारी रात्री अश्विनी भिडे यांनी स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केली. या भेटीनंतर शिंदे यांचा विरोध मावळला असून प्रशासकीय स्तरावरील सर्व अडथळे दूर झाले असल्याचे समजते. महापालिकेची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका महिला आयुक्ताची नियुक्ती होत आहे. विशेष म्हणजे, सध्या मुंबईच्या महापौरपदीही एका महिला लोकप्रतिनिधी विराजमान आहेत. त्यामुळे आशियातील या सर्वात मोठ्या महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत आणि प्रशासनात आता 'महिला राज' पाहायला मिळणार आहे. गेल्या काही काळापासून महापालिका प्रशासनावर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप धुवून काढून पारदर्शक कारभार करणे, हे अश्विनी भिडे यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान असेल.
किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड (KBL) च्या किर्लोस्करवाडी येथील हायड्रॉलिक संशोधन केंद्रातील पंप चाचणी प्रयोगशाळेला राष्ट्रीय चाचणी व प्रमाणीकरण प्रयोगशाळा मान्यता मंडळ (NABL) कडून मान्यता मिळाली आहे. आयएसओ/आयईसी 17025:2017 या आंतरराष्ट्रीय निकषांनुसार मिळालेली ही मान्यता प्रयोगशाळेच्या जागतिक दर्जाच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब करते. या मान्यतेमुळे किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड ही अशी मान्यता मिळवणारी जगातील एकमेव पंप उत्पादक कंपनी ठरली आहे. सांगली जिल्ह्यातील कंपनीच्या प्रकल्पातील ही प्रयोगशाळा केंद्रीय प्रवाही, मिश्र प्रवाही आणि अक्षीय पंपांसह विविध प्रकारच्या रोटो-डायनॅमिक पंपांची कार्यक्षमता तपासते. कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर यांनी या यशाचे श्रेय किर्लोस्करवाडीतील अभियांत्रिकी पथकाच्या गुणवत्ता, अचूकता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांना दिले. भारतात ऊर्जा, जलव्यवस्थापन, सिंचन आणि शहरी विकास क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर जागतिक दर्जाच्या चाचणी क्षमतांचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. 'मेक इन इंडिया' उपक्रमासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या मान्यतेमुळे कंपनीच्या पंप कार्यक्षमतेसंबंधी माहिती स्वतंत्रपणे प्रमाणित आणि जागतिक स्तरावर स्वीकारली जाते. यामुळे जलपुरवठा, वीज, सिंचन आणि संरक्षण क्षेत्रातील खरेदीदारांना तृतीय पक्ष पुनर्चाचणीची गरज कमी होते आणि सरकारी तसेच नियामक मंजुरीची प्रक्रिया अधिक जलद होते. आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा मान्यता सहकार्य संस्था (ILAC) च्या परस्पर मान्यता व्यवस्थेमुळे हे चाचणी निष्कर्ष 100 पेक्षा अधिक देशांमध्ये स्वीकारले जातात. भारताचा पंप बाजार 2024 मध्ये सुमारे 2.90 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका असून 2030 पर्यंत 4.14 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. प्रमाणित आणि गुणवत्ताप्रधान पुरवठादारांना वाढती मागणी मिळत असल्याने, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक फायदा मिळण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ (जिल्हा युवा समिती) यांच्या वतीने पुणे जिल्हा माहेश्वरी प्रीमियर लीग (पीएमपीएल) या व्हाईट लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ४ ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान स्वारगेट येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे होणार आहे. या स्पर्धेत एकूण दीड लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. क्रीडा अध्यक्ष नीरज धूत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी युवा अध्यक्ष रोनक झंवर, युवा सचिव मनीष मणियार, क्रीडा सचिव गितेश झंवर, कोषाध्यक्ष हिमांशू सोनी यांच्यासह अभय करवा, संतोष जाजू, कृष्णा राठी आणि शुभम मंत्री हे पदाधिकारी उपस्थित होते. युवा अध्यक्ष रोनक झंवर यांनी सांगितले की, या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार असून, १९ सामने खेळवले जातील. त्यापैकी १२ सामने लीग टप्प्यात होतील, जे १२ षटकांचे असतील. उपांत्य फेरीचे १६ षटकांचे सामने ११ एप्रिल रोजी होणार आहेत, तर १२ एप्रिल रोजी तिसऱ्या क्रमांकाची लढत आणि अंतिम सामना पार पडेल. स्पर्धेत हाय-बाइट चॅलेंजर्स, मोल्डर्स, प्रारव पँथर्स, सारडा स्टॅलियन, साईज मास्टर्स स्मॅशर्स आणि स्मॅशर योद्धाज हे संघ सहभागी होणार आहेत. सर्व लढती सकाळी नऊ ते दुपारी साडेचारपर्यंत खेळवल्या जातील. विजेत्या संघाला ७१ हजार रुपये आणि उपविजेत्या संघाला ४१ हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांनाही वैयक्तिक पारितोषिके दिली जातील. या स्पर्धेसाठी बेहडे बिल्डकॉन एलएलपी निशांत बेहडे व परिवार हे सलग दुसऱ्या वर्षी मुख्य प्रायोजक आहेत. मेटारोल श्रीमती राधिका बिर्ला हे को-टायटल स्पॉन्सर, बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. हे व्हेन्यू स्पॉन्सर, जीबी ग्रुप गणेश भुतडा ट्रॉफी स्पॉन्सर, तर मॅजेस्टिक लँडमार्क कैलाश मुंदडा जर्सी स्पॉन्सर म्हणून सहभागी आहेत. डीडब्ल्यू रिअल्टर्स अँड लॉ फर्म, स्वनिती, तिरुपती सेल्स एम्पोरियम आणि अरुणकुमार अँड कंपनी हे असोसिएट स्पॉन्सर्स आहेत.
अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना आणि गोंधळी व भटक्या विमुक्त जाती-जमाती विकास संघ, पुणे यांच्या वतीने समाजातील युवक-युवतींसाठी मोफत वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा येत्या रविवारी, ५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कर्वेनगर येथील शुभारंभ लॉन्स येथे होणार आहे. गोंधळी व भटक्या विमुक्त जाती-जमाती विकास संघाचे अध्यक्ष परेश गरुड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष चंदन अटक, सचिव हरीष पाचंगे, खजिनदार रमेश उबाळे, अखिल भारतीय गोंधळी समाजाच्या सदस्य रजनी पाचंगे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भटके विमुक्त विकास परिषद व प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धवजी काळे अध्यक्षस्थानी असतील. पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषाताई नागपुरे आणि इचलकरंजीचे महापौर उदयजी धांडे यांचा यावेळी नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून वधू-वर नोंदणी, सर्वेक्षण तसेच जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि कलाकार पेन्शन यांसारख्या शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले जाईल. समाजातील तरुण-तरुणी, पालक, ज्येष्ठ नागरिक आणि कलाकार यांना एकत्र आणणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे, असे परेश गरुड यांनी सांगितले. गोंधळी, जोशी, बागडी, वासुदेव, चित्रकथी यांसह अन्य भटक्या व विमुक्त जाती-जमातीतील समाजबांधवांच्या कल्याणासाठी संस्थेच्या वतीने सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जातात. तरुणांना रोजगाराची साधने उपलब्ध करून देण्यासह महिलांना आरोग्य व कौशल्य विकासाच्या सुविधा तसेच कला जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. हा कार्यक्रम सर्व समाज बांधवांसाठी विनामूल्य असून, अधिकाधिक समाज बांधवांनी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पुण्यात सायबर चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांची एकूण तीन कोटी १४ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाला गंडा घालण्यात आला, तर दुसऱ्या घटनेत कारवाईची भीती दाखवून एका ज्येष्ठ महिलेला लुबाडण्यात आले. यापैकी पहिल्या घटनेत, सहकारनगर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी एक कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक केली. गेल्या वर्षी ७ डिसेंबर रोजी चोरट्यांनी तक्रारदाराशी संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करण्याचे आमिष दाखवले. फेब्रुवारी महिन्यापर्यंत, या ज्येष्ठ नागरिकांनी टप्प्याटप्प्याने चोरट्यांच्या खात्यात एक कोटी ५२ लाख रुपये जमा केले. मात्र, त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते या प्रकरणाचा तपास करत आहेत. गैरव्यवहार प्रकरणात कारवाईची दाखवली भीती दुसऱ्या एका घटनेत, कोथरूडमधील एका ७७ वर्षीय ज्येष्ठ महिलेची सायबर चोरट्यांनी एक कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक केली. चोरट्यांनी महिलेला तिच्या बँक खात्याचा वापर काळ्या पैशांच्या व्यवहारात झाल्याचे आणि २०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात कारवाई होणार असल्याची भीती दाखवली. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. या भीतीपोटी महिलेने वीस दिवसांत टप्प्याटप्प्याने चोरट्यांच्या खात्यात एक कोटी ६२ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू असून, चोरट्यांच्या खात्यात जमा केलेली रक्कम गोठवण्यासाठी बँकेकडे विनंती करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून सायबर फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना विविध आमिषे दाखवून किंवा कारवाईची भीती घालून त्यांची आयुष्यभराची कमाई लुटली जात आहे. अशा सायबर चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या संशयास्पद वर्तनामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि निकाल आव्हानित करण्यात आला आहे. परिवर्तन उत्कर्ष आघाडीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मतमोजणी करताना अनेक गैरप्रकार झाले. मतपेटी सील करताना एकूण मतदानाची आकडेवारी जाहीर केली नाही. तसेच, किती मतपत्रिका छापल्या, किती पाठवल्या, किती परत आल्या, मृत किंवा दुबार मतदारांची संख्या याबाबत कोणताही हिशेब दिला गेला नाही. उमेदवारांनी आग्रह करूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपत्रिका न दाखवता केवळ वाचून दाखवल्या. 'आमच्यावर विश्वास नाही का?' असे सांगून नीतीमूल्ये पायदळी तुडवल्याचा आरोप आहे. प्रा. मिलिंद जोशी आणि योगेश सोमण यांच्यात केवळ ४५ मतांचे अंतर असताना, तातडीने फेरमतमोजणीची लेखी मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळली. मतमोजणीसाठी आणलेली माणसे निकालानंतर विजयी उमेदवारांसोबत घोषणा देत आणि नाचत होती. यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आघाडीच्या वतीने माजी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, साहित्य परिषदेत आजही परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे बहुमत असून, त्यांनी ३१ पैकी २४ जागा जिंकल्या आहेत. आघाडीला पाठिंबा देणाऱ्या शाखांच्या प्रतिनिधींनी ६२०० मतपत्रिका जमा केल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात ५३०० मते मिळाली. उर्वरित ९०० मते कुठे गेली, याचे उत्तर निवडणूक अधिकाऱ्यांकडे नसल्याचा आरोप आहे. याचप्रमाणे आघाडीच्या उमेदवार मृणालिनी कानिटकर जोशी यांच्या मतांमध्येही निकालानंतर तफावत आढळली, मात्र याबाबतच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. मतदारांनी भरभरून मते दिली असली तरी निवडणूक अधिकाऱ्यांनी पराभव घडवून आणला, असा आरोप करत मसापच्या आजीव सभासदांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात रिट अर्ज (स्टॅम्प क्रमांक ८५६१/२०२६) दाखल करण्यात आला आहे. या याचिकेत निवडणूक प्रक्रिया, मतमोजणी आणि निकाल आव्हानित करण्यात आला आहे. तसेच, तथाकथित निवडून आलेल्या कार्यकारिणीस रिट अर्ज प्रलंबित असेपर्यंत कार्यालयीन कारभार हस्तांतरित करण्यावर स्थगिती मिळावी, अशी मागणी केली आहे. सदर रिट अर्ज तातडीने सुनावणीस घेण्यात यावा यासाठी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना विनंती करण्यात आली असून, सुनावणीची तारीख लवकरच निश्चित होईल अशी अपेक्षा आहे.
पुणे पोलिसांकडून वाहतूक नियमभंगावर कारवाई:तीन दिवसांत 51.54 लाख रुपयांचा दंड वसूल, 852 वाहने जप्त
पुणे शहर वाहतूक पोलिसांनी २७ ते २९ मार्च या कालावधीत वाहतूक नियमभंगाविरोधात विशेष मोहीम राबवली. या तीन दिवसांच्या कारवाईत ट्रिपल सीट प्रवास, मद्यपान करून वाहन चालवणे आणि मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या मोहिमेतून ५१.५४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, ८५२ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या तपासणी मोहिमेदरम्यान सर्वाधिक कारवाई दुचाकीस्वारांवर करण्यात आली. क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच तिघांनी प्रवास करणाऱ्या तब्बल १२६५ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच, ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणारे आणि बेकायदेशीररित्या मॉडिफाईड सायलेन्सर बसवलेल्या ३२० वाहनांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी २३४ सायलेन्सर जप्त केले. केवळ दंड आकारून न थांबता पोलिसांनी कठोर पावले उचलत मोठ्या प्रमाणात वाहने जप्त केली. या मोहिमेत एकूण ८५२ वाहने पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आली. नियमभंग करणाऱ्यांना वचक बसावा आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळाव्यात, यासाठी ही कारवाई निर्णायक ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरोधातही विशेष मोहीम राबवण्यात आली. शहरातील विविध भागांत सुमारे ३० ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान १८६ मद्यपी चालकांना पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळेस मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याचे प्रमाण वाढत असल्याने ही कारवाई महत्त्वाची ठरली. या तीन दिवसांच्या कारवाईत विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार काही लाखांचा दंड आकारण्यात आला असला, तरी एकूण वसुलीचा आकडा तब्बल ५१.५४ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यावरून शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन किती मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे स्पष्ट होते. पोलिसांच्या या मोहिमेमागे रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतुकीत शिस्त निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. विशेषतः मॉडिफाईड सायलेन्सरमुळे होणारा कर्कश आवाज नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होता. त्यामुळे अशा वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. हेल्मेटचा वापर, मद्यपान करून वाहन न चालवणे, वाहनात कोणतेही बेकायदेशीर बदल न करणे आणि निर्धारित नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियम पाळल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुरळीत होऊ शकते, असेही पोलिसांनी नमूद केले.
प्रख्यात शास्त्रीय गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कै. सुधाकर वामन खंडागळे अध्यासन, दुर्गम प्रतिष्ठान, उत्कर्ष महिला मंडळ आणि लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगर यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच भरत नाट्य संशोधन मंदिर यांच्या सहकार्याने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि ‘स्वरगंध’ प्रस्तुत ‘गंधार रंजन २०२६’ हा संगीत कार्यक्रम भारत नाट्य मंदिर येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष सुनील रासने होते. त्यांच्या हस्ते, तसेच भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे आणि लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगरचे मिलिंद तलाठी यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी कै. सुधाकर वामन खंडागळे अध्यासनचे अध्यक्ष डॉ. प्रसाद खंडागळे, दुर्गम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार जाधव, उत्कर्ष महिला मंडळ व आधार सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप काळोखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माणिक वर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रत्नप्रभा गिरे (सांप्रदायिक कार्य), लता जाधव (चित्रपट निर्मिती), सुनंदा मोरे (सामाजिक कार्य), हेमा टाकळीकर (पाककला प्रशिक्षिका), विद्या ताम्हणकर (पुणेरी सुगरण संस्था), स्वाती शेठ (सामाजिक कार्य), विभावरी जाधव (अध्यक्षा, प्रतीशिर्डी संस्थान), ईशा पठारे (राज्यस्तरीय खेळाडू), कल्याणी कदम (महिला मंच) आणि विजया झेंडे (बाल संगोपन केंद्र) यांचा सन्मान करण्यात आला. या महिलांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करत, चार सामाजिक संस्थांनी दिलेले पुरस्कार ऊर्जा देणारे असून, यामुळे त्यांच्या क्षेत्रातील कामाला आणखी बळ मिळाल्याचे सांगितले. यानंतर ‘गंधार रंजन २०२६’ या संगीत कार्यक्रमात दोन गंधारांचा प्रयोग असलेल्या रागांच्या बंदिशी, नाट्यगीते आणि भक्तिगीतांचा सुरेल आविष्कार सादर करण्यात आला. गायिका डॉ. राजश्री महाजन आणि गायक सोमनाथ जायदे यांनी ‘लाविते मी निरांजन त्या सावळ्या तनूचे’, ‘कौसल्येचा राम’, ‘वृंदावनात माझ्या’, ‘एक धागा सुखाचा’, ‘जाने कहाँ’, ‘कही दीप जले’ ही गीते सादर केली. तसेच, जाग, शिवरंजनी, तराणा, मिश्र किरवाणी व भैरवीची रचनाही त्यांनी गायली. ‘कौसल्येचा राम’ हे गीत व्हायोलिनवर माधवी करंदीकर आणि हार्मोनियमवर डॉ. नीलिमा राडकर यांनी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमातून माणिक वर्मा यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या संगीत प्रवासाचेही दर्शन घडवण्यात आले.
संसदेत नुकत्याच मांडण्यात आलेल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती (अधिकार संरक्षण) सुधारणा विधेयक, २०२६ विरोधात मानवाधिकार कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या विधेयकामुळे ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत, ॲड. विकास शिंदे यांनी केंद्र सरकारकडे हे विधेयक तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. प्रस्तावित सुधारणा विधेयक ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या स्व-ओळखीचा (Self-Identification) हक्क हिरावून घेणारे आहे. विधेयकात ट्रान्सजेंडर ओळख मान्य करण्यासाठी वैद्यकीय तपासणी आणि प्रशासकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्याची तरतूद करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांच्या मते, ही तरतूद व्यक्तीस्वातंत्र्याच्या विरोधात आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक एनएएलएसए (NALSA) निकालाचा दाखला देण्यात आला आहे. या निकालात ट्रान्सजेंडर व्यक्तींना स्वतःची लिंग ओळख ठरवण्याचा अधिकार मान्य करण्यात आला होता. मात्र, नव्या विधेयकातील तरतुदी या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जात असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. हे विधेयक भारतीय संविधानातील कलम १४ (समानतेचा हक्क), कलम १९ (स्वातंत्र्याचा हक्क) आणि कलम २१ (जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क) यांचे उल्लंघन करणारे असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांच्या मते, या सुधारणा ट्रान्सजेंडर समुदायावर अन्याय करणाऱ्या, भेदभावपूर्ण आणि मानवी सन्मानाला धक्का देणाऱ्या आहेत.या विधेयकाची तयारी करताना ट्रान्सजेंडर समुदायाशी कोणतीही सल्लामसलत करण्यात आलेली नाही, ही बाबही चिंताजनक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कायदे प्रक्रियेत सहभागी दृष्टिकोनाचा अभाव असल्याची टीका करण्यात आली आहे. ॲड. विकास शिंदे यांनी यावर भाष्य करताना सांगितले की, “ओळख ही व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे. शासनाला ती ठरवण्याचा अधिकार नाही. हे सुधारणा विधेयक म्हणजे संरक्षण नसून नियंत्रण आहे.”या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हे विधेयक मागे घेऊन ट्रान्सजेंडर समुदायाशी व्यापक चर्चा करावी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणारे धोरण तयार करावे, अशी मागणी मानवाधिकार कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
पत्नीच्या माहेरच्या संपत्तीवर माहेरच्यांचाच अधिकार
अमरावती : हिंदू उत्तराधिकार कायद्याबाबत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निकाल दिला आहे. जर एखाद्या हिंदू महिलेला तिच्या आई-वडिलांकडून वारसाहक्काने मालमत्ता मिळाली असेल आणि तिचा मृत्यू मृत्यूपत्र न करता झाला, तर त्या मालमत्तेवर तिच्या पतीचा किंवा सासरच्या मंडळींचा कोणताही कायदेशीर अधिकार राहणार नाही. अशी मालमत्ता थेट महिलेच्या वडिलांच्या वारसांकडे […] The post पत्नीच्या माहेरच्या संपत्तीवर माहेरच्यांचाच अधिकार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध जिल्ह्यांत झालेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जालना, जळगाव, नांदेड, बीड, पुणे आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला असून द्राक्ष, गहू व कांदा पिकांचे अतोनात […] The post राज्याला अवकाळीचा तडाखा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रवादीतून ओबीसी-अल्पसंख्याक सेल गायब
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या संविधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पक्षाचा कणा मानले जाणारे ओबीसी, अल्पसंख्याक आणि सामाजिक सेल नव्या रचनेतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नव्या संविधानात युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवादल या चारच सेलचा समावेश करण्यात आल्याचे समोर आले आहे. २८ फेब्रुवारी रोजी पक्षाच्या राष्ट्रीय […] The post राष्ट्रवादीतून ओबीसी-अल्पसंख्याक सेल गायब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराणी ताराराणी जैन असल्याचा उल्लेख
मुंबई : प्रतिनिधी मुंबईत आयोजित जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर यांनी ‘स्वराज्यरक्षक महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या’ असे विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर म्हणाले, मोहम्मद घोरीने देशावर आक्रमण केले त्यावेळी जैन असलेल्या मेवाड राणीने आपली तलवार काढली. त्यानंतर […] The post महाराणी ताराराणी जैन असल्याचा उल्लेख appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गॅस-पेट्रोलचा तुटवडाही नेहरूंमुळेच
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जनता गॅस सिलिंडरसाठी तासन्तास रांगेत उभी आहे. हा गॅस-पेट्रोलचा तुडवडा पंडित नेहरूंमुळेच झाला असेल! गॅस सिलिंडरसाठी जनता तासन्तास रांगेत उभी आहे, हायवेवरची हॉटेल बंद पडली आहेत, काँग्रेस कार्यालयाबाहेरील हॉटेल बंद आहेत पण सत्ताधा-यांची ‘बनवाबनवी’ अजूनही सुरूच आहे! अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्यातील सरकार यांच्यावर केली आहे. […] The post गॅस-पेट्रोलचा तुटवडाही नेहरूंमुळेच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयामध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंगळवारी सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देताना त्याची पुन्हा अदलाबदली झाल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाची दखल जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेत याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे . यासंबंधीच्या वृत्तानुसार, सोनगरवाडी (ता. वाई) येथील आनंद ओव्हाळ (वय २६) यांनी विषप्राशन केल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. तर आरळे येथील सुरेश मस्कु खोमणे (वय ५१) हे मागील तीन दिवसांपासून उपचार घेत होते. उपचारादरम्यान रात्री त्यांचे निधन झाले. दोन्ही मृतदेहांचे रात्रीच शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, सकाळी नातेवाईकांना चेहरा न दाखवता मृतदेह ताब्यात देण्यात आल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे. मृतदेह ताब्यात दिल्यानंतर आरळे येथील नातेवाईकांनी खोमणे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. पेटवलेली चिता विझविण्यात आली दरम्यान, ही अदलाबदल झाल्याचे लक्षात येताच अंत्यसंस्कारासाठी पेटवलेली चिता विझवण्यात आली. या घटनेमुळे नातेवाईक आक्रमक झाले असून, रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याच्या (स्वीपर) हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नातेवाईकांचा संताप आणि कर्मचाऱ्यांची खडाजंगी सोनगीर वाडी येथील मयत योगाच्या नातेवाईकांनी संबंधित प्रकाराबाबत संताप व्यक्त करत रुग्णालय व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद घातला. मृतदेहाचे तोंड दाखवण्यात न आल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा संताप व्यक्त करत संबंधित कर्मचाऱ्यांना ताबडतोब आमच्या समोर आणा अशी मागणी केली. दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस हा गंभीर प्रकार समोर येतात सातारा पोलीसही घटनास्थळी उपस्थित झाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ युवराज करपे यांनी या प्रकरणांमध्ये दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मृतदेहांचा चेहरा नातेवाईकांना दाखवून खात्री करण्यात आल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. मग नक्की चूक झाली कुठे हे शोधण्यामध्ये आता प्रशासन व्यस्त झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा संबंध भोंदू अशोक खरातशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. भोंदू अशोक खरातकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादांसह महाराष्ट्रातील एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्याने कुणाच्या सांगण्यावरून या फोटोंवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला? असा सवाल रोहित पवार यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे. भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. सध्या तो नाशिक पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याच्यावर नाशिक पोलिसांत तब्बल 10 गुन्हे दाखल करण्यात आलेत. यापैकी 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे, तर उर्वरित 2 गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. खरातशी संबंध असल्याच्या कारणावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना प्रथम राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद व त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी उपरोक्त आरोप केला आहे. कुणाच्या सूचनेनुसार फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला? रोहित पवार यासंबंधी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, जादूटोणासारख्या अंधश्रद्धांना महाराष्ट्र कधीही भीक घालत नाही परंतु जादूटोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तींचा हेतू दुर्लक्षून चालणार नाही. भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय. या भोंदू खरातने कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला? ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता? हेही समोर येणं गरजेचं आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या महाराष्ट्रात कर्तृत्वापेक्षा आणि जनतेच्या कामांपेक्षा असल्या भोंदूगिरीवर विश्वास ठेवला जात असेल तर पुढच्या पिढीला काय संदेश जाणार आहे? हे प्रकरण जेवढं भयावह आहे तेवढंच महाराष्ट्राच्या भविष्यालाही घातक आहे. त्यामुळं या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा करणाऱ्या अंधभक्तांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत. अशोक खरातला तुरुंगातच संपवण्याचा डाव तत्पूर्वी, सकाळी रोहित पवार यांनी अशोक खरातला तुरुंगातच संपवण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप केला होता. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. ते म्हणाले होते, खूप काही जणांची खूप काही माहिती असलेल्या भोंदू खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत येऊन पोहचल्याने आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं तर दुसरीकडं अजितदादांच्या अपघाताची इत्तंभूत माहिती असलेल्या व्ही के सिंगला काहीही झालं तरी वाचवायचं अशा चर्चा आहेत. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, पण सत्य दडपण्यासाठी कोणाचा जीव घेतला जात असेल किंवा सत्य दडपण्यासाठी कोणाला दोषातून वाचवलं जात असेल तर या दोन्ही बाबी योग्य नाहीत. अशी राजकीय रणनीती कुणी आखत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला हे अजिबात आवडणार तर नाहीच उलट लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल. सत्य लपवण्यासाठी एवढा अट्टहास का? अशाने सत्य लपणार आहे का? असो, ‘कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपवता येत नाही, ते कधीतरी बाहेर येतंच’ याचा अनेकांना विसर पडलेला दिसतोय, असे ते म्हणाले होते.
राज्यात पुढचे दोन दिवस पावसाचे
मुंबई : प्रतिनिधी मार्च महिन्यातील कडक उन्हामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरून येणा-या बाष्पयुक्त वा-यांमुळे राज्यात हवामान वेगाने बदलत असून, ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत राज्यातील बहुतांश भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वा-यासह पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध […] The post राज्यात पुढचे दोन दिवस पावसाचे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उष्माघाताचा कहर; दररोज ८० कोंबड्यांचा मृत्यू
वणी : प्रतिनिधी राज्यात वाढत्या उष्णतेने सर्वसामान्य जनजीवनासह आता पशु-पक्ष्यांनाही हैराण केले आहे. सुरगाणा तालुक्यात सध्या तापमानाचा पारा ३७ अंशांच्या आसपास पोहोचला असून, या भीषण उन्हाचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला आहे. बंदिस्त शेडमध्ये वाढवल्या जाणा-या कोंबड्यांना उष्माघाताचा तीव्र फटका बसत असून, दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही […] The post उष्माघाताचा कहर; दररोज ८० कोंबड्यांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. १० वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश आज (३१ मार्च) जारी करण्यात आले असून, यात अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी झालेली नियुक्ती सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. तर, आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांच्याकडे आता 'आपत्ती व्यवस्थापन' या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अश्विनी भिडे: मुंबई महापालिकेच्या आयुक्त १९९५ च्या बॅचच्या सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या अप्पर मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो-३ प्रकल्पातील त्यांच्या कामाचा अनुभव आणि प्रशासकीय पकड पाहता, मुंबईच्या विकासकामांना गती देण्यासाठी सरकारने त्यांच्यावर हा मोठा विश्वास टाकला आहे. मुंबईच्या नागरी समस्या आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने त्यांची नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे. तुकाराम मुंढे: आपत्ती व्यवस्थापन विभागात नवी इनिंग २००५ च्या बॅचचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदावरून 'आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन' आणि वन विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. सध्या राज्यात सुरू असलेला अवकाळी पावसाचा धुमाकूळ, गारपीट आणि नैसर्गिक आपत्तींचे संकट पाहता, अत्यंत कार्यक्षम आणि धडाडीच्या अधिकाऱ्याची या पदावर गरज होती. मुंढे यांच्या अनुभवाचा फायदा राज्याला येणाऱ्या काळात होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या नियोजनात मिळेल, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. लोकेश चंद्र मुख्यमंत्र्यांचे नवे अप्पर मुख्य सचिव १९९३ च्या बॅचचे अधिकारी आणि 'महावितरण'चे (MSEDCL) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची नियुक्ती आता मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांच्या जागेवर आता ते मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाची धुरा सांभाळतील. इतर महत्त्वाच्या बदल्या विकासचंद्र रस्तोगी (१९९५): अप्पर मुख्य सचिव (कृषी) वरून आता वित्त विभागात (वित्तीय सुधारणा) अप्पर मुख्य सचिव म्हणून बदली. विनिता वैद सिंघल (१९९६): प्रधान सचिव (आपत्ती व्यवस्थापन) वरून मृद व जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती. परिमल सिंग (२००४): 'पोकरा' प्रकल्पाचे संचालक आता कृषी विभागाचे सचिव असतील. पृथ्वीराज बी. पी. (२०१४): पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आता वसई-विरार महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील. लाहू माळी: व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई. प्रेरणा देशभ्रतार: राज्य कर सहआयुक्त पदावरून आता मत्स्यव्यवसाय आयुक्त, मुंबई पदी नियुक्ती.
जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. औरंगजेबाचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला, असे विधान आचार्य नयन पद्मसागर यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले. या विधानावर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी संताप व्यक्त केला असून, हे विधान ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करणारे असल्याचे म्हटले आहे. मुंबईत आयोजित जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या, असा दावा केला. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांकडून त्यावर आक्षेप घेण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या इतिहासात ताराराणींचे योगदान अतुलनीय आहे, मात्र त्यांना एका विशिष्ट धर्माच्या चौकटीत मांडल्याने हा वाद निर्माण झाला आहे. नेमके काय म्हणाले इंद्रजीत सावंत? महाराणी ताराराणी या शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा आहेत. स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या आहेत. शिवपुत्र राजाराम महाराज यांच्या त्या पत्नी आहेत. ताराराणी साहेब या मराठा आहेत. या बदल कोणाचेही दुमत असता कामा नये. कारण या संदर्भात शेकडो पुरावे उपलब्ध असल्याचे इंद्रजीत सावंत म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती ताराराणी महाराज या आपल्याच समाजात जन्माला याव्यात असे जगातल्या सर्वच लोकांना वाटते. मात्र असं असलं तरी देखील त्यांच्याबद्दल वक्तव्य करत असताना इतिहासाची माहिती घेणे तितकेच गरजेचे आहे, असे इंद्रजीत सावंत म्हणाले. अहिंसक समाजाने तेढ निर्माण करू नये सध्या एका जैन मुनि यांनी ताराराणी या जैन असल्याचे वक्तव्य केले आहे. जो जैन समाज शांततेसाठी आणि अहिंसेसाठी ओळखला जातो. त्या समाजातील प्रमुखांनी असे वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. मराठा इतिहासाची मोडतोड करण्याचे एक षडयंत्र सुरू आहे. या षडयंत्रचा एक भाग या आचार्य मुनीनी होऊ नये असे मला वाटते. महाराष्ट्र अशा पद्धतीचे वक्तव्य कधीही सहन करणार नाही त्यामुळे या आचार्याने हे समजून घेतले पाहिजे, असेही इंद्रजीत सावंत म्हणाले. जैन मुनींचे विधान काय? महावीर जयंतीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसगर म्हणाले, मोहम्मद घोरीने देशावर आक्रमण केले त्यावेळी जैन असलेल्या मेवाड राणीने आपली तलवार काढली. त्यानंतर पुढील अनेक वर्षे आपल्या देशावर कोणी नजर वर करून बघायची हिंमत केली नाही. संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात तलवार घेणे याला धर्म म्हणतात. विक्रमादित्यने पूर्ण भारताला स्वतंत्र करण्यात मदत केली. औरंगजेब याने संभाजी महाराजांना पकडून हाल केले. त्यावेळी आणखी एक जैन महाराणीचा जन्म झाला आणि ती म्हणजे ताराराणी, असे विधान पद्मसागर यांनी केले आहे. सामाजिक पडसाद उमटण्याची शक्यता थोर पुरुषांच्या आणि वीरांगनांच्या जाती-धर्मावरून याआधीही अनेकदा वाद झाले आहेत. मात्र, महाराणी ताराराणींसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाबाबत थेट 'जैन' असल्याचा दावा केल्याने मराठा समाज आणि इतिहास अभ्यासकांमध्ये नाराजी पसरली आहे. या प्रकरणावर आता आचार्य नयन पद्मसागर आपली भूमिका मागे घेतात की वाद अधिक चिघळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पुणे, नाशिक, धुळे, जळगावसह मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने मोठा हाहाकार माजवला आहे. वादळी वारा आणि गारांच्या कडाक्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मात्र, राज्यावरील हे संकट अद्याप टळलेले नाही. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून काही जिल्ह्यांना 'ऑरेंज' तर काही जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी केला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख सुदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुण्यासह संपूर्ण राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहील. विशेषतः दररोज दुपारनंतर वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ४ एप्रिलनंतरच या पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला इशारा हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव अधिक जाणवेल. गारांच्या वर्षावामुळे फळबागा आणि रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पुढील काही दिवस हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून जाणे किंवा झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांसाठी सूचनाः प्रशासनासाठी उपाययोजना शेतकरी आणि कामगारांसाठी विशेष सूचना अस्मानी संकटामुळे जीवितहानी टाळण्यासाठी सरकारने विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी बांधवांनी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना शेतातील कामे त्वरित थांबवावीत. तसेच, बांधकाम स्थळांवरील कामे तात्पुरती बंद ठेवावीत. यात्रास्थळे किंवा जिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी जमते, असे कार्यक्रम तातडीने स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भोंदू अशोक खरातकडे एक नव्हे तर तब्बल 4 मोबाईल क्रमांक असल्याची बाब समोर आली आहे. हे चारही नंबर तो वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी वापरत होता. विशेषतः खरातने आपल्या जाळ्यात नाशिकमधील नामवंत डॉक्टरलाही ओढले होते. त्यांच्या मदतीने तो आपल्या जाळ्यात अडकणाऱ्या महिलांना गर्भपाताची औषधे देत असल्याचा संशय आहे. त्यामुळे हे डॉक्टरही आता चौकशीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिकि शोषण केल्याचा आरोप आहे. सध्या तो नाशिक पोलिसांच्या कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. पोलिस गत 5 तासांपासून त्याची झाडाझडती घेत आहेत. त्यात अनेक नवनवे खुलासे होत आहेत. यासंबंधीच्या वृत्तानुसार, अशोक खरात वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी 4 वेगवेगळे मोबाईल नंबर वापरत होता. यातील एक क्रमांक तो केवळ व्हीआयपी व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी वापरत होता. या नंबरवरून त्याचा काही राजकीय नेते व प्रभावशाली व्यक्तींशी संवाद होत असावा असा संशय आहे. दुसरा मोबाईल क्रमांकावरून तो आपले काही विशेष भक्त व महिलांशी संपर्क साधत होता. या नंबरवरून झालेल्या संभाषणांचा सध्या तपास सुरू आहे. तिसऱ्या मोबाईल क्रमांकावरून अशोक खरात आपले आर्थिक व्यवहार पाहत होता. या क्रमांकावरून झालेल्या संभाषणावरून त्याला मिळणाऱ्या देणग्या, पैशांचे व्यवहार व इतर आर्थिक देवाण - घेवाण यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय अशोक खरात आपला चौथा मोबाईल क्रमांक हा सर्वसामान्य लोकांशी संपर्क साधण्यासाठी वापरत होता. विशेष तपास पथक या चारही मोबाईल क्रमांकांवरून झालेल्या संभाषणाची माहिती खंगाळून पाहत आहे. या प्रकरणी न्यायवैद्यक पथकाचीही मदत घेतली जात आहे. महिलांना गर्भपाताची औषधी दिल्याचा संशय उल्लेखनीय बाब म्हणजे अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले. पण त्यापैकी एकही महिला गरोदर झाली नव्हती. त्यामुळे अशोक खरात महिलांना एखादी गर्भनिरोधक औषधी देत होता काय? या प्रश्नाचे उत्तर एसआयटी शोधत आहे. या प्रकरणी एसआयटी नाशिकमधील काही डॉक्टरांची चौकशी करण्याचीही चौकशी आहे. हे डॉक्टर अशोक खरातच्या नियमित संपर्कात होते. एसआयटी या प्रकरणी बुधवारी कोर्टात एखादी नवी माहिती सादर करण्याची शक्यता आहे. अशोक खरातला उद्या कोर्टात करणार हजर अशोक खरातची उद्या बुधवारी पोलिस कोठडी संपणार आहे. त्यामुळे पोलिस त्याला उद्या कोर्टात हजर करणार आहे. त्यात ते पुन्हा त्याची कोठडी मागण्याची दाट शक्यता आहे. तूर्त पोलिस अशोक खरातच्या मोबाईलमधून रिकव्हर झालेल्या डेटाचा तपास करत आहेत. यात कॉल रेकॉर्ड्स व व्हॉट्सएप चॅट्सचा समावेश आहे. त्यातून अनेक नवे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिंगोलीत पिसाळलेल्या कोल्ह्याचा थरार संपला!:वन विभागाकडून जेरबंद, नागरिकांचा सुटकेचा निःश्वास
हिंगोली शहरात गेल्या काही तासांपासून धुमाकूळ घालणाऱ्या आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण करणाऱ्या त्या पिसाळलेल्या कोल्ह्याला अखेर वन विभागाने मंगळवारी (ता. 31) शिताफीने पकडले आहे. या कारवाईमुळे जलेश्वर तलाव आणि अंबिका टॉकीज परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. हिंगोली शहरातील अंबिका टॉकीज ते जलेश्वर तलाव कट्टा या मुख्य रस्त्यावर एका पिसाळलेल्या कोल्ह्याचा वावर वाढला होता. हा कोल्हा अत्यंत आक्रमक झाला असून तो रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जात होता. पहाटे आणि रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या लोकांसाठी हा कोल्हा मोठा धोका बनला होता. या कोल्हाने त्याभागातून जाणाऱ्या एकागायीवर केला होता. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. लहान मुले आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, परिणामी नागरिकांनी या रस्त्यावरून ये-जा करणे टाळले होते. दरम्यान नागरिकांनी या प्रकाराची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर, वन विभागाचे विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने, वनपरिक्षेत्र अधिकारी मिनाक्षी पवार यांनी तातडीने कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी रवाना केले. या पथकाने कोल्हा नेमका कुठे दबा धरून बसला आहे याचा कसून शोध घेतला. त्यानंतर काही वेळातच कोल्ह्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले. वन विभागाच्या या जलद कारवाईमुळे परिसरात कोल्ह्याची पसरलेली दहशत संपुष्टात आली आहे. कोल्हा पकडल्याचे समजताच जलेश्वर तलाव परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त करत वन विभागाच्या टीमचे आभार मानले आहेत. आता या परिसरातील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आले असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
मुंबईत आयोजित जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर यांनी 'स्वराज्यरक्षक महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या' असे विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. औरंगजेबाचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. यावरून आता सामाजिक तसेच राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महावीर जयंतीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसगर म्हणाले, मोहम्मद घोरीने देशावर आक्रमण केले त्यावेळी जैन असलेल्या मेवाड राणीने आपली तलवार काढली. त्यानंतर पुढील अनेक वर्षे आपल्या देशावर कोणी नजर वर करून बघायची हिंमत केली नाही. संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात तलवार घेणे याला धर्म म्हणतात. विक्रमादित्यने पूर्ण भारताला स्वतंत्र करण्यात मदत केली. औरंगजेब याने संभाजी महाराजांना पकडून हाल केले. त्यावेळी आणखी एक जैन महाराणीचा जन्म झाला आणि ती म्हणजे ताराराणी, असे विधान पद्मसागर यांनी केले आहे. मराठीची रचना जैन आचार्यने केली पुढे बोलताना तर आचार्य नयन पद्मसगर यांनी मराठीची रचना सुद्धा जैनांनी केली असे म्हटले आहे. ते म्हणाले, एकट्या महाराष्ट्रात 1 कोटी 12 लाख जैन आहेत. मराठी भाषेची रचना जैन आचार्यने केली आहे. तसेच संपूर्ण भारतात जेवढे खरे मराठी जर कोणी आहेत, तर ते सगळे जैन आहेत. जेवढे पाटील आहेत, पाटील कोणता धर्म पाळतात जैन धर्म. पाटील बघा, चौघुले, सरनाईक हे सगळे जैन आहेत. महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना जैनने सुरू केली आहे. तसेच पहिला फिल्म स्टुडिओ जैनने सुरू केल्याचा दावा त्यांनी केला आहे. महाराणी ताराराणी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि राजाराम महाराजांच्या पत्नी असलेल्या महाराणी ताराराणींनी वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी वैधव्य येऊनही अत्यंत खंबीरपणे मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली. मुघलांसह स्वराज्याच्या अनेक अंतर्गत आणि बाह्य हितशत्रूंचा धडाडीने प्रतिकार करत त्यांनी अनेक लढाया आणि बंडांना तोंड दिले. पतीच्या निधनानंतर तब्बल 61 वर्षे मराठा साम्राज्यातील राजकीय स्थित्यंतरांचे साक्षीदार राहत त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि मुत्सद्दीपणाने स्वराज्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात अतुलनीय योगदान दिले. राजाराम महाराजांच्या निधनानंतरमहाराणी ताराबाई बिकट परिस्थितीतही डगमगून न जाता 1701 मध्ये त्यांनी पन्हाळा येथे पुत्राचा राज्याभिषेक करवून घेत स्वराज्याचा कारभार आपल्या हाती घेतला. औरंगजेब एकामागून एक किल्ले हस्तगत करण्याचा प्रयत्न करत असताना ताराबाईंनी रामचंद्रपंत अमात्य, परशुरामपंत प्रतिनिधी आणि सेनापती धनाजी जाधव यांच्या मोलाच्या सहकार्याने स्वराज्याचे समर्थपणे रक्षण केले आणि सिंहगड, राजगड, पन्हाळा, पावनगड, वसंतगड व सातारा यांसारखे महत्त्वाचे किल्ले मुघलांकडून पुन्हा जिंकून घेण्याची पराक्रमी कामगिरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि शिवरायांची सून म्हणून त्यांनी जो पराक्रम गाजवला आहे तो मराठी माणसाच्या मनातून कधीच पुसला जाऊ शकणार नाही. ताराराणी यांच्या शौर्याचे वर्णन करणाऱ्या ओळी: दिल्ली झाली दीनवाणी / दिल्लीशाचे गेले पाणी // ताराबाई रामराणी / भद्रकाली कोपली // ताराबाईच्या बखते / दिल्लीपतीची तखते / खचो लागली तेवि मते / कुराणेही खंडली // रामराणी भद्रकाली / रणरंगी कृद्ध झाली // प्रलयाची वेळ आली / मुगलहो सांभाळा //
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. तथाकथित भोंदूबाबा अशोक खरात यांच्या प्रकरणात जरांगे पाटील यांनी जाणीवपूर्वक भूमिका स्पष्ट केली नसल्याचा आरोप हाके यांनी केला. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. लक्ष्मण हाके यांच्या मते, भोंदूबाबा अशोक खरात यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. या प्रकरणात पक्षातील अनेक नेत्यांनी खरात यांच्या समर्थनार्थ वर्तन केल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, रूपाली चाकणकर यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली नसून, दरबारी राजकारणाला प्राधान्य दिल्यामुळे सामान्य समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचे हाके म्हणाले. अजित पवार यांच्या नेतृत्वावरही हाके यांनी टीका केली. त्यांच्या सहानुभूतीचा प्रभाव आता कमी झाल्याचे ते म्हणाले. बारामती पोटनिवडणुकीबाबत बोलताना हाके यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही असे स्पष्ट केले. पुढील दोन दिवसांत उमेदवाराची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुका ओबीसी समाजासाठी एक संधी असल्याचे हाके यांनी नमूद केले. यापूर्वी लक्ष्मण जगताप आणि रमेश वांजळे यांच्या निधनानंतरही निवडणुका लढवल्या गेल्या होत्या. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची कोणतीही परंपरा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हाके यांनी पार्थ पवार यांच्या कारकिर्दीवरही टीका करत, त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, सुनेत्रा पवार यांना थेट निवडणुकीत उतरवण्याऐवजी विधान परिषदेमार्फत संधी द्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. बारामतीतील विकासकामांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, काही रस्त्यांचा विकास झाला असला तरी शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. पवार कुटुंबाकडेच सत्तेची पदे केंद्रित असल्याचा आरोप करत, सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
आमदार शिवतारेंना मुलीने दिली किडनी
पुणे : प्रतिनिधी वडील आणि मुलीचं नातं हे फार वेगळं असतं. लहानपणी बाप लेकीचा आधार बनतो तर कठीण काळात मुलगी वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. असेच बाप-लेकीच्या प्रेमळ नात्याचे हृदयस्पर्शी उदाहरण समोर आले आहे. पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांना त्यांच्या कन्या डॉ. ममता शिवतारे यांनी किडनी दान करून नवजीवन दिले आहे. वडिलांना पुन्हा एकदा नव्या […] The post आमदार शिवतारेंना मुलीने दिली किडनी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पिंपरी : प्रतिनिधी गॅस टंचाईमुळे वाढत्या महागाईच्या झळा आता बेकरी उद्योगालाही अस होऊ लागल्या आहेत. एकेकाळी गोड सुगंधाने भरलेले बेकरीचे वातावरण सध्या चिंतेच्या छायेत आहे. त्यामुळे बेकरी चालकांनी उत्पादनांच्या दरवाढीचा निर्णय घेण्यात असून सोमवार (दि.३०) पासून ब्रेड, बिस्किटे, केक यांसारख्या पदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे. बेकरी उत्पादक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सईदुद्दिन अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या […] The post पाव, खारी, टोस्टची दरवाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी तथा पक्षाच्या नेत्यांची बदनामी करण्यासाठी एका एजन्सीला तब्बल 5 कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी केला आहे. आमच्या पक्षातील प्रश्न सोडवण्यासाठी, कुणी चुकला तर त्याला शिक्षा देण्यासाठी आमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार सक्षम आहेत. त्यामुळे कुणीही आमच्या पक्षात लुडबूड करू नये. यापुढे आमच्या पक्षावर टीका केली, तर त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असे ते म्हणालेत. आमदार रोहित पवार गत काही दिवसांपासून सातत्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर विशेषतः सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत. त्यांनी त्यांच्यावर पक्षाच्या संघटनेतील काही प्रमुख फ्रंटल सेलही वगळल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर सूरज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांच्यावर पक्षाची बदनामी करण्यासाठी सुनियोजित मोहिम चालवण्याचा पलटवार केला आहे. ते म्हणाले, रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी, पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी एका एजन्सीला 5 कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर खोटे आरोप करण्यासाठी त्यांनी नेमणुका केल्या आहेत. फ्रंटल संघटना वगळल्याचा आरोपही फेटाळला ते पुढे म्हणाले, रोहित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे काम करत आहेत. राष्ट्रवादीत कशी फूट पडेल, राष्ट्रवादीत कशी भांडणे लागतील, यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे. त्यांच्याच एका प्रवक्त्याने पत्रकार परिषद घेऊन अशी बातमी सोडली की, राष्ट्रवादीच्या पक्षातून काही फ्रंटल वगळण्यात आले. त्यात ओबीसी, सामाजिक न्याय व इतर सेलचा समावेश आहे. त्यांनी अर्धवट माहिती माध्यमांना दिली. ही माहिती धादांत खोटी आहे. आमचा पक्ष स्थापन झाल्यापासून फ्रंटलचे 5 विभाग आहेत. यात फादर बॉडी, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, युवक बॉडी, विद्यार्थी व सेवा दलाचा समावेश आहे. विरोधक एक कागद दाखवत महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. त्यांनी असे सांगितले की, सेवा दल, ओबीसी सेल, सामाजिक न्याय व अल्पसंख्याक हे सेल फ्रंटलमधून वगळण्यात आले. पण हे सेल कधीही फ्रंटलमध्ये नव्हते. ते सेल म्हणून राष्ट्रवादीत कार्यरत होते. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रातील आर्टिकल 27.1 मधील ही माहिती आहे. पण पत्रकारांना थेट आर्टिकल 30 ची देण्यात आली. त्यातील 28 चा पेपर वगळण्यात आला. या आर्टिकल 28.1 मध्ये एससी, एसटी, मायनॉरिटी, किसान, लोकल बॉडींचा समावेश आहे. त्याची माहिती निवडणूक आयोगालाही देण्यात आली आहे. या संघटनांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात आल्यापासून सेलचा दर्जा देण्यात आला आहे, असे सूरज चव्हाण म्हणाले. जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा इशारा ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत कसा येईल, त्याची कशी बदनामी होईल, राष्ट्रवादीची प्रतिमा कशी मलिन होईल यासाठी रोहित पवार व त्यांच्या टीमकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. माझे त्यांना सांगणे आहे की, जेवढे लक्ष तुम्ही आमच्या पक्षावर देत आहात, तेवढेच लक्ष तुम्ही तुमच्या आमदारांवर द्या. तुम्ही तेवढेच लक्ष तुमच्या खासदारांवर, तेवढेच लक्ष तुम्ही तुमच्या संघटनेतील कार्यकर्त्यांवर द्या. कारण, ते तुमच्या पक्षात नाही, तर दुसऱ्या पक्षात आहेत. आज तुमचे मोहोळचे आमदार कोणत्या पक्षाचे बॅनर लावून कार्यक्रम घेत आहेत हे पाहा. सोलापूर जिल्ह्यातील तुमचे आमदार, खासदार कोणत्या पक्षाच्या नेत्याच्या बॅनरखाली काम करतात ते ही पाहा. त्यानंतर आमच्या नेत्यांवर बोला. आमच्या पक्षातील प्रश्न सोडवण्यासाठी, पक्षात कुणी चुकला तर त्याला शिक्षा देण्यासाठी सुनेत्रा पवार सक्षम आहेत. कुणीही आमच्या पक्षात लुडबूड करू नये. यापुढे आमच्या पक्षावर टीका केली, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही सूरज चव्हाण यांनी यावेळी दिला.
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी आखाती देशांतील तणावाचे पडसाद आता थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर उमटू लागले. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम विदर्भातील शेतीमालाच्या दरांवर होत आहे. आखाती देशांतील तणावाचे पडसाद आता थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर उमटू लागले. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम विदर्भातील शेतीमालाच्या […] The post बाजारात गव्हाचे दर घसरले! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिला व बालविकास मंत्री ‘बेपत्ता’!
मुंबई : प्रतिनिधी नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने पुरोगामी महाराष्ट्राची देशपातळीवर अब्रूचे धिंडवडे निघालेत. महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी, त्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी, शोषण रोखण्यासाठी महायुतीमधील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे काय काम करत आहे? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निशाणा साधला आहे. काँग्रेस हर्षवर्धन सपकाळ यांनी, […] The post महिला व बालविकास मंत्री ‘बेपत्ता’! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगरात आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाला आमदार संजय केणेकर यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. सामान्य नागरिक, कष्टकरी आणि लहान विक्रेत्यांवर याचा परिणाम होणार असल्याने हा निर्णय तातडीने स्थगित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात संजय केणेकर यांनी महापौर, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना निवेदन देत आपली भूमिका स्पष्ट केली. केणेकर म्हणाले की, सर्वसामान्य माणूस आठवडी बाजारातूनच स्वस्त दरात माल खरेदी करतो. तसेच कष्टकरी आणि छोटे विक्रेते आपला माल विकून उदरनिर्वाह करतात. बाजार बंद झाल्यास या दोघांवरही अन्याय होईल. बाजार बंद केल्यास मॉल संस्कृतीला चालना मिळेलते पुढे म्हणाले, आठवडी बाजार बंद केल्यास मॉल संस्कृतीला चालना मिळेल, ज्यामुळे लहान व्यापाऱ्यांचे नुकसान होईल. यामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या मुद्द्यावर शहरातील व्यापाऱ्यांमध्येही नाराजीचे वातावरण असून, प्रशासन आता यावर काय निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आठवडी बाजार बंद झाला तर आत्महत्या करू: छत्रपती संभाजीनगरच्या शेतकरी व्यापाऱ्यांचा इशारा, नगरसेवक म्हणतात बाजार रस्त्यावर नको संभाजीनगरमध्ये महापालिका आयुक्तांची हुकूमशाही सुरू आहे. आठवडी बाजार बंद झाले, तर आम्ही आत्महत्या करू. आम्ही अफगाणिस्तानचे नसून इथलेच आहोत. आम्ही संपूर्ण आयुष्य या व्यवसायावर काढले. आमची मुले लग्नाला आली आहेत. या धंद्यावर आम्ही कर्ज काढले आहे. जर व्यवसाय बंद झाला, तर आम्ही कर्ज फेडायचे कसे आणि जगायचे कसे असा प्रश्न आम्हासमोर आहे. कामगारांचा पगार कसा द्यायचा. आम्हाला आता कोणी रोजगार देणार नाही. त्यामुळे आम्हाला चोरीचे परवाने द्यावेत. आम्ही चोऱ्या करतो किंवा महापालिका आयुक्तांनी पगार सुरू करावा, अशी मागणी भाजीपाला व्यावसायिकांनी केली. दुसरीकडे नगरसेविकांनी बाजार रस्त्यावर भरू नये, तो गाळ्यात भरावा अशी भूमिका मांडली. संभाजीनगरमधील चिकलठाणा, जाफर गेट आणि शहानूरमियाँ दर्गा (पीर बाजार) येथील ऐतिहासिक आठवडी बाजार कायमचे बंद करण्याची घोषणा महापालिका आयुक्तांनी केलीय. विशेष म्हणजे या भागात सध्या भाजीपाला मंडईची महापालिकेची कसलिही योजना नाही. तत्पूर्वीच हे बाजार आता बंद केले जाणार आहेत. त्यामुळे दिव्य मराठी डिजिटलने शहानूरमियाँ दर्गा येथील आठवडी बाजारात जाऊन व्यापारी, नागरिक आणि राजकीय नेत्यांची मते जाणून घेतली. संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट येथे वाचा...
भोंदू अशोक खरात प्रकरणात महिलांना जाळ्यात ओढण्याची त्याची पद्धत आणि महिला आयोगाकडे तक्रार घेऊन येणाऱ्या पीडितांना थेट खरातकडेच पाठवण्याचे धक्कादायक प्रकार उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली असून, या पार्श्वभूमीवर खरातच्या 'शिवनिका ट्रस्ट'च्या आजी-माजी सदस्यांची 'एसआयटी'मार्फत चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीसाठी माजी सदस्य रुपाली चाकणकर यांना समन्स बजावूनही त्या अद्याप हजर झालेल्या नसल्याने तर्कवितर्कांना उधाण आले असून, त्यांनी चौकशीला सहकार्य न केल्यास कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांना अटकही होऊ शकते, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. रुपाली ठोंबरे म्हणाल्या, खरात प्रकरण एसआयटीकडे गेले आहे. आज आठ दिवस झाले. काल रुपाली चाकणकर यांना एसआयटीचे समन्स गेले होते. त्यामुळे त्या आता आजाराचे कारण देऊ शकत नाही. एसआयटीने कुठल्या तरी कार्यक्रमाचे निमंत्रण दिलेय या आविर्भावात त्या असतील. पण हे निमंत्रण नाही. एका भयंकर गुन्ह्यासाठीचे समन्स आहे. पहिले कारण सांगितले आजारी आहेत.. पण याच्यानंतर? त्यांना चौकशीसाठी जावेच लागेल. नाही गेल्या तर अटक करावी लागेल. ती कायद्याची प्रोसेस आहे. तिथे कुठलाही तोरा चालत नाही. त्यांना कुठले गांभीर्य नाही. अशी व्यक्ती महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षपदी होती. याचा मला खेद वाटतो. मेंटॉस बाई आहे ही, अशा शब्दात ठोंबरे यांनी टीका केली आहे. चाकणकर माध्यमांसमोर आता कधीच बोलू शकत नाहीत पुढे बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या, रुपाली चाकणकर माध्यमांसमोर आता कधीच बोलू शकत नाहीत. सगळा मागचा इतिहास काढा. त्यांच्या चुकांवर त्या कधी बोलत नाहीत. दोन दिवसात मी पुराव्यासह तुमच्यासमोर येईल, एवढेच त्या म्हणतात. त्या या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही. नेत्यांकडून त्यांना जो फेवर देण्यात आला, त्यामुळे त्यांची मानसिकता तशी झालेली आहे. कायद्याने हे एवढे सोप्पे नाही याची प्रचिती काही दिवसात त्यांना येईल. चुकीची बाई देऊन राजकारणाला काळा डाग बसवला रुपाली ठोंबरे यांनी रायगड कनेक्शनवरही टीका प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, रुपाली चाकणकर यांचे पती नीलेश चाकणकर हे रायगडच्या रोहा येथे 400-500 कोटींची उलाढाल असणाऱ्यांसोबत पार्टनर्शिप करतात. याची ईडी, इन्कम टॅक्सकडून चौकशी होणार आहे. कारण त्या तक्रारी तिकडेही गेलेल्या आहेत. एक चुकीची बाई देऊन अख्या राजकारणाला काळा डाग बसवला. यापुढे राजकारण्यांनी नैतिकता बघून गोष्टी करणे गरजेचे आहे. पक्षाच्या बाहेर तुम्ही कुणाचीही संबंध ठेवा. 10 नाहीतर 25 जणींशी संबंध ठेवा. पण त्यांचे लाड पुरवण्याचे काम पक्षातून होता कामा नयेत. अन्यथा अशी वाईट वेळ येते, असा टोलाही ठोंबरे यांनी लगावला आहे.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक विवेकवादी संशोधक इतिहासकार गमावला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. जयसिंगराव पवार यांची इतिहासाची मांडणी वेगळ्या धाटणीची होती, तिला सखोल संशोधन आणि चिंतनाचे अधिष्ठान होते, असे डॉ. सबनीस म्हणाले. डॉ. जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवप्रेमी, डोंगरे प्रतिष्ठान आणि विविध संस्थांच्या वतीने पुण्यात एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले की, जयसिंगराव पवार यांनी त्यांच्या इतिहास लेखनातून शाहू महाराजांचे कर्तृत्व भारतात आणि भारताबाहेरही पोहोचवले. छत्रपती शिवाजी महाराज ते राणी ताराबाई यांच्या कर्तृत्वाला त्यांनी लेखणीतून न्याय दिला. सत्ताधाऱ्यांचे दबाव आणि प्रलोभनांना बळी न पडता सत्य इतिहास कथन करणाऱ्यांच्या यादीतील जयसिंगराव पवार हे शेवटचे महत्त्वाचे नाव होते. इतिहासकाराला डावी-उजवी बाजू असू शकत नाही, त्याला विवेकवादी मध्यम भूमिका स्वीकारावी लागते, असे पवार यांचे मत होते. त्यांनी भाऊराव अण्णा पाटील यांच्यापासून प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांवर पुस्तके लिहिली. इतिहासाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आणि नवीन संशोधक फळी निर्माण होण्याच्या दृष्टीने त्यांनी इतिहास परिषद आणि इतिहास प्रबोधिनीसारख्या संस्थांची निर्मिती केली. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून अनेक संशोधकांनी प्रेरणा घेतली. इतिहास लेखन करताना त्यांनी तार्किकता आणि वस्तुनिष्ठता याबाबतीत कधीही तडजोड केली नाही. याप्रसंगी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या प्रतिनिधी प्रा. अनुराधा कुलकर्णी यांनीही आपले विचार मांडले. त्या म्हणाल्या की, भारत इतिहास संशोधक मंडळासारख्या इतिहास क्षेत्रात महत्त्वाचे काम करणाऱ्या संस्थेने जयसिंगराव पवार यांना नुकताच जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. माझ्या प्रत्येक संदर्भ ग्रंथाला जयसिंगराव पवार यांनी कौतुकाची थाप दिली होती. इतिहास लेखनाच्या बाबतीत संदर्भाविषयी कोणतीही शंका असल्यास ते फोन करून पडताळून घ्यायचे, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला प्रा. सोपान शेंडे, साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, गंगाधर बनबरे आणि शिवप्रेमी, डोंगरे प्रतिष्ठानचे प्रमुख मारुती प्र. डोंगरे उपस्थित होते.
माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पुणे येथील कोरेगाव पार्क येथील एका संशयास्पद जमीन व्यवहार प्रकरणी तातडीने विशेष तपास पथक (एसआयटी) चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या प्रकरणात नाशिकमधील अशोक खरात व त्यांचे सहकारी सीए ललित प्रकाश पोफळे यांच्या कुटुंबीयांचा संबंध असल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे. विजय कुंभार यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील सीटीएस ५७ येथील सुमारे ५० गुंठे जमीन व्यवहारात गंभीर अनियमितता आढळून आल्या आहेत. संबंधित दस्तऐवज (दस्त क्र. ६५८७, नोंदणी वर्ष २०२४) तपासल्यावर ही जमीन मूळतः एका सार्वजनिक ट्रस्टची असल्याचे समोर आले आहे. मात्र, धर्मादाय आयुक्तांची आवश्यक परवानगी न घेता किंवा संगनमताने ती हस्तांतरित करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विक्रीऐवजी असाइनमेंट/कन्फर्मेशन डीड या व्यवहारात १९२८ आणि १९३५ मधील सेटलमेंट डीडचा उल्लेख असला तरी, त्याच्या प्रमाणित प्रती उपलब्ध नाहीत. त्यामुळे मूळ मालकी हक्कावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, विक्रीऐवजी असाइनमेंट/कन्फर्मेशन डीड करण्यात आल्याने स्टॅम्प ड्युटी टाळण्याचा आणि मालकी हक्क लपवण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, १९८७ मधील व्यवहार २०२४ मध्ये कन्फर्म करण्यात आल्याने तब्बल ३५ वर्षांचा विलंब संशयास्पद मानला जात आहे. सुमारे १०० कोटी रुपये किंमतीच्या मालमत्तेची कागदोपत्री किंमत फक्त १९.५६ कोटी रुपये दाखवण्यात आल्याने काळ्या पैशाचा वापर आणि बेनामी गुंतवणुकीचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. एसआयटी, ईडी, एसीबी मार्फत चौकशी हवी विजय कुंभार यांनी या प्रकरणात एसआयटी, ईडी आणि एसीबी मार्फत संयुक्त चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी पोफळे आणि खरात यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करावी, तसेच बेनामी व्यवहार कायदा आणि मनी लॉन्डरिंग अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय, संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा व वाङ्गमय विभागाचे माजी प्रमुख, संशोधक, समीक्षक डॉ. सतीश बडवे यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची रवींद्रनाथ टागोर नॅशनल फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे. तामिळनाडूमधील 'तंजावर येथील मराठी कवींची वाङ्गमयीन कामगिरी व योगदानाचे स्वरूप' हा त्यांच्या बृहत संशोधन प्रकल्पाचा विषय आहे. तामिळनाडू प्रांतातील तंजावर येथील राजे शरफोजी भोसले सरस्वती महालातील हस्तलिखितांच्या आधारे हा संशोधन प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. मराठी काव्य परंपरेतील हा महत्त्वाचा ठेवा असून त्याचा परिचय करून देणारा हा महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प आहे. त्यासाठी डॉ. बडवे यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची रवींद्रनाथ टागोर नॅशनल फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे. तामिळनाडूस्थित तंजावर येथे जाऊन डॉ. सतीश बडवे हे या संशोधनाचे काम पूर्ण करणार आहेत. डॉ. सतीश बडवे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख राहिलेले आहेत. त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यामध्ये 'मध्ययुगीन मराठी वाङ्गमय : चिंतन आणि चर्चा', 'भक्तीपरंपरेचा आंतरप्रांतीय अनुबंध', 'आकलन आणि अन्वयार्थ', 'मध्ययुगीन साहित्याविषयी', 'संत साहित्य समीक्षेचे बीजप्रवाह', 'साहित्याची सामाजिकता' या प्रमुख ग्रंथांचा समावेश आहे. त्यांनी नऊ ग्रंथांचे साक्षेपी संपादन केलेले आहे. विविध वाङ्गमय नियतकालिकांच्यामधून त्यांचे सातत्याने लेखन प्रसिद्ध होत असते. डॉ. बडवे यांनी गो. पु. देशपांडे यांच्या इंग्रजी लेखांचे, प्रा. भालचंद्र नेमाडे यांच्या 'इग्नो' मधील इंग्रजी भाषणांचे, पी. नरसिंहाचारी यांच्या 'रामानुज' या इंग्रजी 'मोनोग्राफ' चे मराठी भाषांतर, अनुवाद केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 30 विद्यार्थ्यांनी एम. फिल्. पदवी पूर्ण केली आहे. तर 15 विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवीचे संशोधन पूर्ण केले आहे. 'भक्ती परंपरेचा आंतरप्रांतीय अनुबंधाचा शोध' या प्रकल्पासाठी त्यांना यु. जी. सी. कडून संशोधन शिष्यवृत्ती जाहीर झालेली होती. 'मराठवाड्याच्या सीमावर्ती प्रदेशातील भाषिक व सांस्कृतिक आदान- प्रदान' या संशोधन प्रकल्पासाठी त्यांना 2014 मध्ये आय. सी. एस. एस. आर. मधून शिष्यवृत्ती मिळाली होती. 'मध्ययुगीन कालखंडातील विविध धर्मसंपदाच्या पदरचना : एक शोध' हा प्रकल्प त्यांनी 2020 ला पूर्ण केला. या तीनही प्रकल्पासाठी त्यांना संशोधन शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली होती. महाराजा सयाजीराव विश्वविद्यालय बडोदा, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, मुंबई विद्यापीठ मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, या विद्यापीठाच्या संशोधन आणि मान्यता समितीवर व अभ्यास मंडळावर त्यांनी काम केलेले आहे. त्याचप्रमाणे सध्या ते पैठण येथील संतपीठाच्या अभ्यास मंडळावर कार्यरत आहेत. राज्य मराठी विकास संस्था मुंबई येथे अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. 11वी- 12वीच्या वैकल्पित मराठी पुस्तकाच्या संपादक मंडळात त्यांनी काम केलेले आहे. डॉ. सतीश बडवे यांच्या ग्रंथांना 'गुरुकुल प्रतिष्ठानचा संत चोखामेळा पुरस्कार, ज्ञानप्रबोधिनी निगडी पुणे यांचा विशेष ग्रंथ लेखन पुरस्कार', 'महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा समीक्षा लेखन पुरस्कार', आणि 'सर्वोदय साहित्य मंडळाचा साहित्य गौरव पुरस्कारा' ने सन्मानित करण्यात आलेले आहे.

29 C