वेरूळ येथील भोसले चौक बसस्थानकात बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. ‘स्मार्ट शहर बस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनपा बसच्या इंजिनमध्ये अचानक स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटानंतर काही क्षणांतच बसमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागला. त्यामुळे बसस्थानक परिसरात उपस्थित असलेले लोक घाबरून इथून तिथे पळू लागले. ही बस छत्रपती संभाजीनगर ते वेरूळ या मार्गावर धावणारी असून, ती बिघाडामुळे भोसले चौकात दुरुस्तीसाठी उभी करण्यात आली होती. सुदैवाने या बसमध्ये त्या वेळी एकही प्रवासी नव्हता. त्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्ती सुरू असताना अचानक इंजिनमधून मोठा आवाज झाला आणि लगेचच धुराचे लोट बाहेर येऊ लागले. या घटनेने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानाचा परिणाम बसच्या कार्यक्षमतेवर होत असल्याचे समोर येत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे ‘स्मार्ट शहर बस’ वारंवार बंद पडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. बुधवारी घडलेल्या या प्रकारातही उन्हामुळे इंजिन अधिक तापले असावे आणि त्यामुळेच स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज चालकाने व्यक्त केला आहे. या स्फोटानंतर वेरूळ परिसरातील नागरिक, पर्यटक आणि भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे बससेवेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. आता सिटी बसने प्रवास करणे सुरक्षित आहे का? असा सवाल अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. या घटनेमुळे सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वास डळमळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच मनपा परिवहन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. बसच्या इंजिनचा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व बसांची विशेष तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यक खबरदारी घेतली जाईल प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर वेरूळमध्ये भीतीचे वातावरण असले तरी मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून संताप व्यक्त करत प्रकाशकाला थेट फोनवरून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाचे वारे वाहू लागले आहेत. सोशल मीडियावर या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. शिवाजी महाराजांविषयी अनादर केल्याचा आरोप करत गायकवाड यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. माहितीनुसार, दिवंगत प्राध्यापक गोविंद पानसरे यांनी सुमारे 37 वर्षांपूर्वी ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाच्या शीर्षकावरूनच आक्षेप घेत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन केला. या संभाषणात त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. शिवाजी महाराजांविषयी असा उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. फोनवरील संभाषणात गायकवाड यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. त्यांनी प्रकाशकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही सांगितले जात आहे. तुला घरात घुसून मारेल, चिरडून टाकेल, जीभ कापेल, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केल्याची माहिती आहे. या विधानांमुळे प्रकरण गंभीर बनले असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, प्रकाशक प्रशांत आंबी यांनीही या प्रकरणात आपली बाजू मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, हे पुस्तक त्यांनी लिहिलेले नसून प्राध्यापक गोविंद पानसरे यांचे आहे. तसेच हे पुस्तक 1988 साली प्रकाशित झाले असून त्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी गायकवाड यांना आधी पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही समोर आले. या वादात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, प्रकाशकाने गायकवाडांच्या धमक्यांना घाबरून न जाता ठाम भूमिका घेतली. तुम्ही उद्या या आणि माझी जीभ कापा, असे उत्तर देत त्यांनी प्रतिकार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा वाद केवळ राजकीय न राहता अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरही केंद्रित होताना दिसत आहे. व्हिडिओ प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दरम्यान, या प्रकरणावर वाढता दबाव पाहता संजय गायकवाड यांनी नंतर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, त्यात त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केल्याचे दिसते. या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांबाबतची संवेदनशीलता आणि त्यावरून होणारे राजकीय वाद चर्चेत आले आहेत. पुढील काळात या प्रकरणावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत जोडजवळा शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परसह 7.15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 22 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात वाळू घाटांवरून अवैध वाळू उपसा व वाहतुक करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभागाची पथके कार्यरत ठेवली असून पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी पोलिस दलाची पथके सतर्क केली आहेत. या पथकाकडून वाळू घटाच्या मार्गावर दररोज वाहनांची तपासणी केली जात आहे. यामध्ये अवैध वाळू उपसा व वाहतूक करणारी वाहने जप्त केली जात आहेत. दरम्यान, हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत जोडजवळा शिवारातून पूर्णा येथून एका टिप्परमध्ये वाळू आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक युवराज गवळी, जमादार ताम्रध्वज कासले, सुर्यवंशी यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी वाहनांची तपासणी सुरु केली होती. यावेळी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी एक टिप्पर थांबवून तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आली. सदर वाळू पूर्णा येथून आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी टिप्पर चालक सलमान काझी (रा. पुर्णा) याची चौकशी केली असता त्याच्या जवळ वाळू वाहतूकीची कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले शिवाय पोलिसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरेही देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी टिप्पर व वाळू असा 7.15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हट्टा पोलिस ठाण्यात आणला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव यांच्या तक्रारीवरून सलमान काझी (रा. पुर्णा), अनिल बागल (रा. पूर्णा)यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जमादार सुर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. खरातने महिलांचे शोषण केल्यानंतर त्यांच्या गर्भपातासाठी काही नामांकित डॉक्टरांची मदत घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या नव्या घडामोडींमुळे केवळ गुन्हेगारी नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. तपास अधिक खोलात जात असल्याने आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशोक खरात स्वतःला ‘दैवी शक्ती’ असलेला व्यक्ती म्हणून सादर करत महिलांना आपल्या जाळ्यात अडकवत होता. घरगुती अडचणी, वैयक्तिक समस्या दूर करण्याचे आमिष दाखवत त्याने अनेक महिलांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात एका पीडित महिलेच्या गर्भपाताचा मुद्दा समोर आल्यानंतर तपासाची दिशा बदलली. गर्भपात नेमका कुठे आणि कसा करण्यात आला, याचा शोध घेताना पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. तपास यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, खरातच्या संपर्कात काही बडे डॉक्टर आणि सोनोग्राफी केंद्र चालवणारे व्यक्ती होते. पीडित महिला गरोदर राहिल्यानंतर त्यांना गर्भपातासाठी औषधे देण्यात येत होती. ही औषधे नियमबाह्य पद्धतीने कशी मिळाली, याचा शोध घेतला असता काही डॉक्टरांनीच ती पुरवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय नाशिक महानगरपालिकेतील एका डॉक्टराचा देखील या प्रकरणात संबंध असल्याचा संशय तपासात पुढे आला आहे. हा डॉक्टर खरातच्या संपर्कात होता आणि काही प्रकरणांमध्ये मदत करत असल्याची शक्यता तपासली जात आहे. काही खासगी सोनोग्राफी केंद्रांमध्ये पीडित महिलांची तपासणी करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, याचाही तपास सुरू आहे. या सर्व बाबींचा तपास सध्या वेगाने सुरू असून, संबंधितांकडून चौकशी केली जात आहे. कल्पना खरात हिच्याविरोधातही कारवाई दरम्यान, या प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्याविरोधातही कारवाई सुरू आहे. जमीन फसवणूक प्रकरणात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ती सध्या फरार असल्याचे सांगितले जाते. तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र राहाता न्यायालयाने सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर तिचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे या प्रकरणात तिच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर गुंडा पाटीजवळ भरधाव वाहनाच्या धडकेने आंध्रप्रदेशातील एका भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 22 सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी वाहन चालकाचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशातील काही भाविक एका टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कंपनीद्वारे बारा ज्योतिर्लिंगाच्या यात्रेसाठी गेले होते. उज्जैन, प्रयागराज व इतर देवस्थानांच्या ठिकाणी दर्शन घेऊन मंगळवारी ता. 21 औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी गेले होते. रात्रीच्या वेळी नागनाथाचे दर्शन घेऊन भाविक परळी वैजनाथकडे निघाले होते. मात्र बुधवारी ता. 22 रात्र झाल्यामुळे त्यांनी औंढा नागनाथ ते परभणी शिवारात गुंडा शिवारात मुक्काम करण्याचे ठरविले होते. त्यानुसार रात्री मुक्कामी थांबले होते. दरम्यान, बुधवारी ता. 22 पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास व्यंकटेश्वरा नागनाथ गच्चे (62) रा. रुद्रपेठ बायपास, अनंतपूर जिल्हा अनंतपूर, आंध्रप्रदेश) हे लघुशंकेसाठी उठले होते. यावेळी रस्ता ओलांडत असतांना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षस संग्राम जाधव, उपनिरीक्षक युवराज गवळी, जमादार ताम्रध्वज कासले, शेख हाकीम, स्वामी यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस व भाविकांनी अपघातातील गंभीर जखमी झालेल्या व्यंकटेश्वरा यांना उपचारासाठी हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या प्रकरणी प्रकाश एकबोटे यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालका विरुद्ध हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक गवळी पुढील तपास करीत आहेत.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोकसंख्या आणि भौगोलिक रचनेच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या माहुली चोर येथील प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती लोकवर्गणीतून करण्यात आली. त्यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या या कृतीमुळे लोकप्रतिनिधींना लाजवेल, असे काम झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. सदर गाव हे अमरावती-यवतमाळ मार्गावर असल्यामुळे परिसरातील अनेक गावांतील नागरिक येथूनच प्रवास करतात. मात्र, मागील काही वर्षांपासून येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली होती. बसण्यासाठीचा ओटा पूर्णपणे उखडला होता. छतावरील टीनपत्रेही तुटली होती. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याकडे या विभागाच्या लोकप्रतिनिधींनी कधीही लक्ष दिले नाही. त्यांना हे काम करावेसेच वाटले नाही. अशा स्थितीत गावातील काही युवकांनी एकत्र येऊन या गंभीर समस्येची दखल घेत तो निवारा दुरुस्त केला. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही त्यासाठी मदत केली. अंकुश कोल्हे, अंकेश खांडेकर, राजू पवार, अमोल इंगोले, अक्षय पवार, रोशन मेश्राम, आदित्य चोरे, रोशन गाडेकर, नरेंद्र जाधव, संकेत चापले, स्वप्निल चोरे व इतर सहकाऱ्यांनी शिवजयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबवत लोकवर्गणी गोळा केली आणि या लोकवर्गणीतून निवाऱ्याची दुरुस्ती केली. अशाप्रकारे लोकसहभागातून हा प्रवासी निवारा पुन्हा उभा ठाकला. लोकवर्गणीतून काय केले ? लोकवर्गणीतून याठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी नव्याने ओटा बांधण्यात आला. छतावरील टीनपत्रेही बदलण्यात आली. त्यामुळे आता प्रवाशांना उन, पावसापासून संरक्षण मिळत आहे. आरामदायी बसण्याची सोयही उपलब्ध झाली आहे. दरम्यान गावातील तरुणांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत उचललेले हे पाऊल इतरांसाठीही प्रेरणादायी ठरले आहे.
संपाचा तिसरा दिवस; नागरिकांचे हाल:तहसील कार्यालयातून दाखले मिळत नाही- ग्रामस्थ त्रस्त
जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप तिसऱ्या दिवसाकडे वाटचाल करित आहे. या आंदोलनामुळे तहसील कार्यालयातून प्राप्त होणारे दाखले नागरिकांना मिळणे बंद झाले असून आरोग्यसेवासुद्धा कोलमडली आहे. त्यामुळे नागरिकांना हाल सहन करावे लागत आहे. दरम्यान संपाबद्दल तोडगा काढण्यासाठी आज, बुधवारी मुंबईत मुख्य सचिवांसोबत सुकाणू समितीची बैठक पार पडली. यावेळी १८ मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. परंतु त्यातून कोणताही ठोस उपाय बाहेर आला नाही. त्यामुळे संप उद्या, गुरुवारीही सुरुच राहणार असल्याचे समन्वय समितीचे निमंत्रक तथा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अमरावती शाखेचे सरचिटणीस डी. एस. पवार यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. दरम्यान आज, बुधवारी सकाळी त्यांच्याच नेतृत्वात येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये निदर्शने करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी उद्या, गुरुवारीसुद्धा अशीच एकजूट कायम ठेऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.
शहरातील घराघरांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे नियमानुसार स्वच्छता कंत्राटदाराद्वारे चालवल्या जाणाऱ्या घंटागाड्या दररोज संकलन करतात की नाही, यावर वचक ठेवण्यासाठी शहरातील प्रत्येक घर, वसाहतींमध्ये क्युआर कोड लावण्यात आले आहेत. परंतु, कमी मनुष्यबळ, मर्यादित घंटागाड्या आणि अपुऱ्या साहित्याची बाब दडवण्यासाठी स्वच्छता कंत्राटदार नियमांची पायमल्ली करीत क्युआर कोड स्कॅनच करीत नाहीत. कारण, ते आठवड्यातून केवळ एक किंवा दोन दिवस, काही रहिवासी भागांमध्ये तर ८ ते १० दिवसांतून एकदाच घंटागाडीद्वारे कचरा संकलित करतात. आपले पितळ उघडे पडू नये म्हणून घंटागाड्या क्युआर कोड स्कॅन करीत नसून हे नियमाचे उल्लंघन असले तरी ते सर्रास केले जात आहे. यासाठी मनपा सभागृहाने स्थापन केलेल्या स्वच्छता अभ्यास गटाने प्रति घटना प्रति दिवस १ हजार रु. दंडाची शिफारस केली आहे. मात्र, मनपा प्रशासन अजुनही, उर्वरित, पान.४ स्वच्छता कंत्राटदाराकडे प्रत्येक प्रभागात सरासरी ५४ स्वच्छता कामगार हवेत. तसेच कराराचा भाग अ व भाग ब मिळून एकूण १२५१ कामगार तसेच ५१८ वाहने असणेही अनिवार्य आहे.परंतु, स्वच्छता अभ्यास गटाला यात उणीव व अनियमितता आढळली आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ मनुष्यबळासह वाहने व साहित्याची उणीव भरून काढण्यासोबतच धुवारणी व फवारणीही करण्याची मागणी केली आहे. कागदावर बळ : प्रत्यक्षात बोंबाबोंब! कंत्राटाच्या अटींनुसार, प्रत्येक प्रभागात ५४ स्वच्छता कामगार असणे अनिवार्य आहे. करारातील भाग ‘अ' आणि ‘ब' मिळून एकूण १२५१ कामगार आणि ५१८ वाहने असणे गरजेचे असताना, साहित्याचा मोठा तुटवडा आहे. मनपाची ‘अभ्यासगिरी': कारवाई कधी? स्वच्छता कंत्राटदाराच्या कामावर बारकाईने लक्ष असल्याचे प्रशासन सांगत असले, तरी स्थिती ‘जैसे थे' आहे. अभ्यास गटाने अहवाल देऊनही प्रशासन तो ‘बघत' असल्याचे सांगून कारवाई टाळत आहे. कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. डॉ. अजय जाधव, स्वच्छता अधिकारी, मनपा. ‘डिजिटल' खेळ : क्यूआर स्कॅन होत नाही स्वच्छता कंत्राटदाराकडून नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. दररोज कचरा संकलन होत नसल्याने, आपली ‘पोलखोल' होऊ नये म्हणून घंटागाडी कर्मचारी मुद्दाम क्यूआर कोड स्कॅनिंग टाळत आहेत. दणका : कंत्राटदारावर दंडाची तलवार मनपाने स्थापन केलेल्या १९ सदस्यीय सर्वपक्षीय स्वच्छता अभ्यास गटाने कंत्राटदाराच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. शहराचे कंत्राट घाईत आणि पूर्वनियोजन न करता देण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अभ्यास गटाच्या अहवाल बघितल्यानंतरच कारवाई ^स्वच्छता अभ्यास गटाने आमसभेत अहवाल सादर केला आहे. परंतु, तो बघितला नाही. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चरने आधीच्या तुलनेत कामात सुधारणा केली असली तरी ती समाधानकारक म्हणता येणार नाही. त्यामुळेच अहवाल बघितल्यानंतरच त्यांच्या कामात त्रुटी आढळल्यास निश्चितच कारवाई होणार. वर्षा लड्डा, आयुक्त, मनपा. शहर स्वच्छतेचे कंत्राट देण्याचा घाईने घेतलेला निर्णय शहर स्वच्छतेचे केंद्रीय कंत्राट देण्याचा मनपा प्रशासनाने अत्यंत घाईने निर्णय घेतल्याचे निरीक्षण मनपा सभागृहाद्वारे सभागृह नेते चेतन गावंडे यांच्या नेतृत्त्वात स्थापन केलेल्या १९ सदस्यीय सर्वपक्षीय स्वच्छता अभ्यास गटाने नोंदवले आहे. अभ्यास गटात सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, गटनेते नाना आमले, शेख हमीद शेख वाहद, डॉ. राजेंद्र तायडे, सदस्य नगरसेवक अनिल अग्रवाल, अॅड. प्रशांत देशपांडे, दिनेश बुब, संजय नरवणे, मिलींद चिमोटे, बबलू शेखावत, प्रशांत वानखडे, मंगेश मनोहरे, भोजराज काळे, अजय जयस्वाल, नजीब खान, नूतन भुजाडे व सुरेखा लुंगारे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. प्रत्येक प्रभागामध्ये हवेत ५४ कामगार
चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठानच्या वतीने २९ एप्रिल रोजी होणाऱ्या अशोक पर्व महोत्सवात सर्वजातीय उपवर-वधूंची नोंदणी होणार आहे. राज्यस्तरीय या महोत्सवात यंदा सामाजिक दायित्वाचा नवा आदर्श निर्माण करण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे. प्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कार सोहळे, पुस्तक वितरण, असे सामाजिक दायित्व निभावणारे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. सर्वजातीय उपवर-वधू नोंदणी हे महोत्सवाचे वेगळेपण राहणार आहे. समाजातील विवाहयोग्य तरुण-तरुणींना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सर्वजातीय उपवर-वधू नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या नोंदणीमध्ये सर्व जातीय उपवर-वधू-वरांना संधी देण्यात येणार आहे. विवाहयोग्य विधवा, विधुर, घटस्फोटीत यांचीही नोंदणी करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या समारोपानंतर आबासाहेब खेडकर सभागृहात या नोंदणी प्रक्रियेचे आयोजन करण्यात येणार असून इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा. संपूर्ण माहिती अशोक प्रतिष्ठानकडे देण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अशोक पर्व समितीच्या बैठकीत हा समाजोपयोगी निर्णय घेण्यात आला. अशोक पर्व महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांबाबत संवेदनशीलता जपत ठोस उपक्रम राबविण्याची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठानचे सामाजिक दायित्व अधोरेखित होत आहे. बैठकीला अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय आठवले, पॅक्टोचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे, प्रा. सुनील कांबळे आदी उपस्थित होते. भारतीय इतिहासातील सुवर्णयुगाचे शिल्पकार सम्राट अशोक हे भारतीय अस्मितेचे जिवंत प्रतीक असून त्यांच्या कार्याची होत असलेली उपेक्षा थांबवण्यासाठी ‘अशोक पर्व’च्या चळवळीत सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे प्रभावी आवाहन खासदार बळवंतराव वानखडे यांनी केले. ते राज्यस्तरीय ‘अशोक पर्व’ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत बोलत होते. सम्राट अशोक यांनी भारतात सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणत लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेची स्थापना केली, असे खा. वानखडे म्हणाले. जनतेच्या हितासाठी स्वतःचे संपूर्ण जीवन समर्पित करणारे ते जगातील पहिले कल्याणकारी शासक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या विचारांचे प्रतीक असलेले अशोक चक्र आणि अशोक स्तंभ आपण राष्ट्रीय पातळीवर स्वीकारले असले तरी त्यांच्या कार्याची योग्य दखल आजही घेतली जात नाही, ही खंत त्यांनी व्यक्त केली. लढ्यात सामील व्हा : खासदार वानखडे
लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघड:6457 बोगस महिलांकडून 11 कोटी वसूल, पण ‘लाडके भाऊजी’ अजूनही मोकाट
राज्यात राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसतानाही अनेकांनी चुकीची माहिती देत पैसे उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, काही पुरुषांनी स्वतःला महिला दाखवत योजनेचा लाभ घेतल्याचेही उघड झाले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार, राज्यभरात एकूण 12,757 पुरुषांनी ‘लाडकी बहीण’ बनून सुमारे 22.96 कोटी रुपयांचा गैरफायदा घेतला आहे. दुसरीकडे, बोगस महिला लाभार्थ्यांपैकी 6,457 जणींकडून सुमारे 11 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना यासंदर्भात पत्र पाठवून कारवाई सुरू केली होती. मात्र, ही वसुली केवळ 50 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर 2025 मध्ये करण्यात आलेल्या ई-केवायसी आणि पडताळणी प्रक्रियेदरम्यान या बनावट लाभार्थ्यांचा पर्दाफाश झाला. त्यानंतर 29 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1981 अंतर्गत काही संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते. या कारवाईनंतर काही प्रमाणात वसुली झाली असली, तरी अजूनही मोठी रक्कम थकबाकीत आहे. विशेष बाब म्हणजे, महिला लाभार्थ्यांकडून वसुली सुरू असताना पुरुष लाभार्थ्यांबाबत मात्र प्रशासनाने ठोस पावले उचलल्याचे दिसत नाही. 9 ऑक्टोबर 2025 रोजी महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी ग्रामविकास विभागाकडून अहवाल मागवला होता. मात्र, साडेपाच महिन्यांनंतरही पुरुषांकडून वसुलीसाठी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे हे बनावट पुरुष लाभार्थी सरकारचे ‘लाडके भाऊजी’ ठरत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रियेवर भर दिला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यापूर्वी ही मुदत 31 मार्चपर्यंत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. योजनेची विश्वासार्हता धोक्यात जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. त्यामुळे ही योजना राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची ठरली आहे. मात्र, बनावट लाभार्थ्यांच्या प्रकारामुळे योजनेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. आता उर्वरित वसुली आणि दोषींवर कठोर कारवाई कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कचरा संकलनासाठी शुल्क विरोधात उबाठाचे आंदोलन:ठराव विखंडन करण्याची केली मागणी
महापालिकेतील सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा अकोलेकरांवर ६०० रुपयांचा आर्थिक भार लादल्याचा आरोप करत मालमत्ता करामध्ये समाविष्ट करण्यात आलेले कचरा संकलनाचे ६०० रुपये शुल्क तत्काळ करण्याची मागणी शिवसेना उबाठा गटाचे शहरप्रमुख आशिष गावंडे यांनी केली. भाजपने सभागृहात मंजूर केलेला ठराव विखंडनासाठी शासनाकडे पाठवावा, अशी मागणी महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याकडे करण्यात आली. यापूर्वी सन २०१७ मध्ये मनपा प्रशासनाने मालमत्ता करात मोठ्या प्रमाणावर दरवाढ केली होती. त्या वाढीचा आर्थिक फटका शहरवासी अद्यापही सहन करत असताना आता पुन्हा कचरा संकलनाच्या नावाखाली ६०० रुपयांचे अतिरिक्त शुल्क लादणे म्हणजे सर्वसामान्य नागरिक आणि झोपडपट्टी भागातील गरीब कुटुंबांची आर्थिक पिळवणूकच असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. मनपा सभेत केलेला ठराव तातडीने विखंडनासाठी शासनाकडे पाठवावा, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक शंकर लंगोटे, शहरप्रमुख राहुल कराळे, मनपा गटनेता विजय इंगळे, नगरसेवक अभय खुमकर, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, शहर संघटक अनिल परचुरे, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे आदी उपस्थित होते. ...तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा निर्णय मागे घेतला गेला नाही, तर कायदेशीर लढा उभारण्यासोबतच जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. शहरप्रमुख आशिष गावंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात भाजपच्या मनमानी कारभाराचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
विरोधी पक्षांविरोधातील निषेध मोर्चास प्रतिसाद:महिला आरक्षण देश हिताचे असल्याचा संदेश
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेस व इतर विरोधी पक्षांविरोधात येथील सशक्त नारीशक्ती अकोला ग्रामीण मंडळ चोहट्टा यांच्या वतीने मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी संतोष शिवरकर, राजेश नागमते, योगेश गोतमारे, विठ्ठल वाकोडे, मधुकर फाटकर, किशोर सरोदे, गोपाल आमले, दत्ता गावंडे, ज्ञानेश्वर झामरे, माधुरी बगे, सुभाष घनबहादूर, राधेश्याम ताडे, मयूर चहाजगुणे, गोलू देंडव, अभी मंगळे आदींची उपस्थिती होती. महिलांच्या अधिकारांवर घाला घालणाऱ्या वृत्तीविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मोर्चेकऱ्यांमधील राजेश नागमते म्हणाले की, महिला आरक्षण हे महिला व देशहिताचे आहे. महिलांच्या हितावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, गरज पडल्यास मोठे आंदोलन उभारणार, असा इशारा यावेळी माधुरी बघे यांनी दिला. दरम्यान महिला आरक्षणास विरोध करणाऱ्या पक्षांच्या विरोधात काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शाळेतील विद्यार्थीनी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे या मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मोर्चात सहभागी विद्यार्थीनींनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत महिलांसाठी हे विधेयक किती महत्वाचे असल्याचे पटवून दिले.
जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य विभागाकडून आरोग्यविषयक योजनांची व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण होण्यास मदत होत असल्याचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या मोहिमेत एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण, टीबीमुक्त भारत अभियान (टप्पा २), तापमानामुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचाव, ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान तसेच पॅलिएटिव्ह केअर सेवा देण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालये, ग्रामसभा, गटसभा, सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध स्पर्धा व उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणावर आरोग्यविषयक जनजागृती केली जात आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेला देखील जिल्हाभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य विषयक लसीकरण पूर्ण करण्यासाठी मदत होईल असा विश्वास देखील या निमित्ताने आरोग्य विभागाकडून व्यक्त केला जात आहे. यावेळी नितीन थुटे, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. मुख्याध्यापक व शिक्षकांनी या उपक्रमाला सहकार्य केले. या सर्वसमावेशक जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत सकारात्मक बदल होत आहेत. विशेषतः एचपीव्ही लसीकरण मोहिमेला प्रतिसाद वाढत आहे. विद्यार्थी, शिक्षकांना दिले आरोग्य शिक्षणः या मोहिमेचा एक भाग म्हणून पातूर तालुक्यातील माळ राजुरा येथील सुधाकरराव नाईक विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत ८ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेत १४ वर्षे पूर्ण व १५ वर्षे अपूर्ण असलेल्या मुलींना समाविष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील या वयोगटातील २८,३७६ मुलींना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ८,०५९ मुली ग्रामीण तर २०,३१७ मुली शहरी भागातील आहेत. आतापर्यंत १,२८८ मुलींना लस देण्यात आली असून, पुढील काळात हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता, पालक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
आमदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर आणि महानगरप्रमुख राहुल कराळे या त्रिकुटांनी पक्ष त्यांच्या दावणीला बांधला आहे. पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या आमच्यासारख्या प्रामाणिक तळागाळातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षात नियुक्ती करताना विचार केला जात नाही. विश्वासात घेतले जात नाही. पक्षाचे संपर्कप्रमुख अनिल कदम यांच्या कानावर ही बाब टाकूनही त्यांनी या पक्षाच्या ‘त्रिकूट’ नेत्यांकडे दुर्लक्ष केल्याने आम्ही शहरातील ७० पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी माझ्या नेतृत्वात पक्षाचा सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती पक्षाच्या शिवसेना अकोला उपशहरप्रमुख प्रकाश बळीराम वानखडे यांनी येथे बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित या पत्रकार परिषदेला अकोला शहर उत्तर विभागाचे प्रमुख सतीश नागदेवे, विभाग प्रमुख सतीश वानरे, उपविभागप्रमुख मंगेश पावले, अर्जुन क्षिरसागर, रोशन अहीर, गजानन पाल, योगेश गवळी, युवा सेना उपशहरप्रमुख अविनाश कोकरे आदी उपस्थित होते. त्यांच्यासोबत पक्षाचे महिला आणि पुरुष कायकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हयातील उद्धव ठाकरे सेनेच्या उपनेत्यांसह जिल्हा-शहर स्तरावरील पदाधिकारी यांनी दाबलेला आमचा आवाज उद्धवजी साहेबापर्यंत पोहोचवा, एवढीच माफक अपेक्षा आहे. शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आमचे म्हणणे ऐकावे. आम्ही पक्ष सोडून अन्य पक्षात जाण्याच्या तयारीत सध्या तरी नाही, असेही या पदाधिकारी यांनी सांगितले आहे. अकोला शहरातील शिवसेना तथा युवा सेना शहरप्रमुख यांची नियुक्ती करताना कुठल्याही पदाधिकारी यांना विश्वासात घेतले जात नाही. पक्षाचा कार्यकर्ता नसलेल्या व्यक्तीस शहर प्रमुख पद दिले. मनपा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातून आयात केलेल्या उमेदवार पराभूत झाल्यावरही त्याला स्वीकृत सदस्य पद देण्यात आली. त्यामुळे शहरातील कट्टर शिवसैनिकांत नाराजी आहे. मनपा निवडणुकीत पक्षातर्फे नगरसेवक पदाची निवडणूक लढवणाऱ्यांना पक्षाच्या जिल्हास्तरीय वरिष्ठांनी एकही प्रचारसभा घेतली नाही. परिणामी पक्षाचे उमेदवार पराभूत झाले. पक्षाचे उपनेते तथा आमदार, जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुख हे निष्ठांवत शिवसैनिकांचा सन्मान करत नाही. अशी आहेत सामूहिक राजीनामा देण्यामागील प्रमुख कारणे
तापमानाचा पारा पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. बुधवारी अकोल्याचा पारा ४३.७ अंशांवर पोहोचला. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने विदर्भात यलो अलर्ट जारी करत शुक्रवार ते रविवार दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आगामी पाच दिवसात तापमानात २ ते ४ अंशांदरम्यान वाढ होणार आहे. ४८ तासांत पारा २ अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे २९ एप्रिल ते १ मे दरम्यान विदर्भात कोरडे व उष्ण वातावरण राहणार आहे. अकोल्यात तापमानाने यावर्षी सर्व विक्रम तोडले असून एप्रिल महिन्यात देशात सर्वाधिक तापमानाची (४५ अंश) नोंद झाली आहे. बुधवारी विदर्भातील वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ४४.२ अंश तापमान नोंदवले गेले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात पुन्हा तापमानवाढीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शुक्रवार ते रविवार दरम्यान विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांचे तापमान पुन्हा वाढणार आहे. म्हणजेच अकोल्याचे तापमान आगामी तीन दिवसात ४५ अंशांवर जाण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. प्रा. डॉ. सुरेश चोपने, हवामानतज्ञ. २०१९ मध्ये दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद शहरात २९ एप्रिल २०१९ रोजी दशकातील सर्वाधिक ४७.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तसेच २०२६, २०२७, २०१८ मध्ये ४५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. २०२२ मध्ये ४५.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तसेच यावर्षी १९ एप्रिल रोजी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४५ अंश तापमानाची नोंद झालेली आहे.
बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीत ही निवडणूक लागली असून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत. मतदानाच्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद असल्याचे सांगितले. मतदानापूर्वी सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्या क्षणी वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. अनेक वर्षे बारामतीसाठी काम करणाऱ्या अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी नतमस्तक होऊन आदरांजली वाहिली. या घटनेने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भावनिक रंग अधिक गडद झाल्याचे दिसून आले. मतदानानंतर बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, बारामतीकर सकाळपासून मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडत आहेत. अजितदादांनी वर्षानुवर्षे मतदारसंघासाठी केलेल्या कामाची परतफेड लोक मतदानातून करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही निवडणूक केवळ राजकीय नसून भावनिकही असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली असून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला. त्यांनी सांगितले की, दादांशिवाय कोणतेही काम करण्याची सवय नाही, मात्र आता वास्तव स्वीकारावे लागेल. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झाले. त्यांनी बारामतीकरांना आवाहन करताना, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान करून आपला सहभाग नोंदवावा, असे म्हटले. यावेळी अजित पवार यांच्या मातोश्रींचे वय 89 वर्षे असल्याने त्यांनी घरीच मतदान केले असल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली. मतदानासाठी जाण्यापूर्वी त्यांनी मातोश्रींचे आशीर्वाद घेतल्याचेही सांगितले. या सर्व घडामोडींमुळे पोटनिवडणुकीला भावनिक रंग चढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. किती मताधिक्याने विजयी होणार, याकडे लक्ष दरम्यान, पार्थ पवार यांनीही काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेवर निवडीमुळे पार्थ पवार राज्यसभेत गेले आहेत. तसेच, अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार हे मतदान केंद्र परिसरात कार्यकर्त्यांमध्ये सक्रिय दिसून आले. आता या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार किती मताधिक्याने विजयी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनपाच्या मोर्णा नदी स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर शहरातील सर्व प्रभागांत शुक्रवार, २४ एप्रिलपासून साफसफाई अभियान राबवण्यात येणार आहे. याअभियानात भाजपच्या सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, नगरसेवक आणि नागरिकांचा लोकसहभाग राहणार आहे. सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ७ अशा दोन टप्प्यात हे साफसफाई अभियान राबवले जाईल. त्याचे नियोजन मनपाच्या स्वच्छता विभागातर्फे २३ एप्रिलला जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, नगरसेवक जयंत मसने, शहर सुधार समितीचे गटनेते पवन महल्ले आदी उपस्थित होते. सभापती अग्रवाल यांनी सांगितले की, ‘मनपाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा, कचरा संकलन घंटागाडी, गटारी, नाले साफसफाई, पथदीवे, रस्ते, अग्नीशमन सेवा आदी दैनंदिन अत्यावश्यक २६ सेवा लवकरच ऑनलाइन पुरवण्यात येणार आहे, त्याच्या निविदेस स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच शहरातील कचरा संकलनापोटी घंटागाडी चालकांकडून यापुढे ५० रुपये महिना आकारणी बंद करुन ती वर्षभराची एकत्रित रक्कम ६०० रुपये मालमत्ता करात आकारणी करण्यावर शिक्कामोर्तब केल्याचे त्यांनी सांगितले. २०१६ नंतर जन्मलेल्यांचा जन्मदाखला त्याच दिवशी तत्काळ देणे सुरू करण्यात येईल. ६०० कोटी रुपये शहरातील रस्त्यांसाठी निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. १३ नवीन जलकुंभांचे शहराच्या विविध भागात करणार बांधकाम करणार. ११ मनपा मराठी शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी प्राप्त झाला असून लवकरच दुुरुस्ती करण्यात येईल. १० किलोमीटर मोर्णा नदी पात्रात स्वच्छता अभियान राबवण्यास सुरवात झाली आहे. ४ महिन्यात शहरात पीएम ई- सिटी बस सेवा सुरु करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. ३ हजार फुटांपर्यंतच्या गुंठेवारी भूखंडांना नियमानुकूल करण्याची वर्षभराची मुदत देण्यात आली आहे. जिगाव प्रकल्पावरून शहरासाठी २८ एमएलडी पाण्याचे आरक्षण मंजूर झाले असून, या प्रकल्पावरून निमकर्दा प्रकल्पावरुन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. पुढील दीड-दोन वर्षांत जिगाव प्रकल्प आणि महान येथील काटेपूर्णा प्रकल्प मिळून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा विचार करता शहरातील वाढीव हद्द भागासह संपूर्ण शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे, अशी माहितीही सभापती विजय अग्रवाल यांनी यावेळी दिली. कर नियमानुसार ६०० रुपये कर आकारणी ही नियमानुसार आहे, नागरिकांनी शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टिने हातभार लावण्यासाठी या निर्णयास सहकार्य करावे. विरोधकांकडे कोणताच मुद्दा न उरल्याने ते या निर्णयास विरोध करत आहेत. आमचे काही चूकत असेल तर त्यांनी आवश्यक सांगावे पण केवळ विरोधासाठी विरोध करु नये. आम्ही कोणतीही कर वाढ जनतेवर लादणार नाही.
येथील उपजिल्हा रुग्णालयाला २००४ मध्ये ५० तर २०१४ मध्ये १०० खाटांचा दर्जा मिळूनही गेली २२ वर्षे सुसज्ज इमारती अभावी रुग्ण सेवा केवळ ३० बेडपुरतीच मर्यादित राहिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली तर मोजणी फी कुणी भरायची यात अडकल्याने तालुक्यातील रुग्णांना आरोग्य सुविधां खोळंबल्या आहेत. तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आरोग्यमंत्री स्व. दिग्विजय खानविलकर यांच्या पुढाकाराने सन २००४ मध्ये त्यावेळी असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयास ५० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी देण्यात आली.पुढे सन २०१४ मध्ये शासनाने त्यास १०० बेडची मान्यता दिली. मात्र त्याप्रमाणात इमारतीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने अनेक अधिकाऱ्यांची भरतीही होऊ शकलेली नाही.त्यामुळे १०० बेडची मान्यता असूनही शासनाकडून रुग्णालयाला केवळ ३० बेडचेच अनुदान मिळते व त्यावरच हा कारभार सुरू आहे. खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून १५ सप्टेंबर २०२५ मध्ये जिल्हाधिकारी यांनी स.न.८४/६/२ ब क्षेत्र ५६ आर ही जागा उपलब्ध करून दिली. माळशिरस तालुका हा आरोग्य सेवांचा केंद्र बिंदू असल्याने उपचारासाठी आसपासच्या तालुक्यातील रुग्णही येथे उपचारासाठी येतात. रुग्ण दाखल झाल्यानंतर उत्तर मिळेपर्यंतच त्यांची प्रकृती गंभीर होते.याठिकाणी शव चिकीत्सक नसल्याने अशा वेळी बाहेरून मागवावे लागतात. त्यामुळे मृत्यूनंतरही रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा लागतो ही वस्तुस्थिती अधीक्षक डॉ.ओव्हाळ यांनी मांडली.मोजणी फी भरून घेतल्याशिवाय किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी निःशुल्क मोजणीचे पत्र दिल्याशिवाय तातडीने मोफत मोजणी करता येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अशा पत्रासाठी उपजिल्हा रुग्णालयाने आता ८ महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयत्न सुरू केले आहेत.मात्र शासकीय कर्मचारी संपामुळे त्यास ही मुहूर्त मिळाला नाही. सात महिन्यापासून रखडली मोजणी अनेक वर्षांनंतर नवीन इमारतीसाठी जागा उपलब्ध झाल्याने उपजिल्हा रुग्णालयाने या जागेच्या मोजणीसाठी माळशिरस भूमी अभिलेख कार्यालयाकडे प्रकरण पाठवले.मात्र त्यासाठी त्यांनी मोजणी फी भरण्यास सांगितले. यावर जिल्हा शल्य चिकित्सकांनी नरखेड रुग्णालयाची निःशुल्क मोजणी झाल्याचा दाखला देत शासकीय जागेसाठी शासनाच्या आरोग्य विभागाने शासनाला फी भरावी लागत नसल्याची भूमिका घेतली. मात्र भूमी अभिलेख कार्यालयाने त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आदेशाची मागणी केली.यात ७ महिने मोजणी रखडली. जागा व इमारतीअभावी या उपजिल्हा रुग्णालयात भरतीही न झाल्याने अतिदक्षतासारखे अनेक विभाग सुरूच झालेले नाहीत. गंभीर रुग्ण, विशेषतः रक्तस्राव झालेल्या प्रसूती मातां सारख्या रुग्णांना सोलापूरला पाठवावे लागत आहे.
वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर करण्यात आलेले स्वतंत्र कल्याणकारी मंडळ गेल्या १४ ते १५ महिन्यांपासून कार्यान्वित झाले नसल्याने राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी व अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे मंडळ तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे करण्यात आली. निवेदन पंढरपूर तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या कडे देण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची घोषणा केली होती. या घोषणेमुळे राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, घोषणेनंतर १४ ते १५ दिवस उलटूनही वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ कार्यान्वित झाले नसल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी वाढली आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात श्रीकांत भारती यांनी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर माहिती व जनसंपर्कमंत्री आशिष शेलार यांनी पुढील अधिवेशनापूर्वी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न लक्षात घेऊन हे मंडळ लवकरात लवकर कार्यान्वित करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न पंढरपूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ तातडीने कार्यान्वित करण्याच्या मागणीचे निवेदन पंढरपूरचे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रि यांना देण्यात आले. यावेळी जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते शेखर तेंडुलकर, आनंद तेंडुलकर, उमेश फावडे, संजय दहिहंडे उपस्थित होते.
राज्यात सध्या लग्नसराईचा धूमधडाका सुरू आहे, मात्र वधू-वरांच्या अंगावर चढणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांची चकाकी यंदा फिकी पडण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दागिन्यांवर कलाकुसरीचे नक्षीकाम करणारे पश्चिम बंगालचे महाराष्ट्रातील तब्बल १६ लाख कारागीर मतदानासाठी आपल्या गावी परतले आहेत. याचा मोठा फटका अहिल्यानगरमधील सराफ बाजारालाही बसला असून, नक्षीकाम केलेल्या दागिन्यांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. कोट्यवधींच्या आगाऊ ऑर्डर्स रद्द करण्याची वेळ आता सराफ व्यावसायिकांवर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. हे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी २० एप्रिलपासूनच कारागिरांची रीघ लागली आहे. मुंबईतील अनेक कारागिरांनी विमानाने, तर इतरांनी विशेष रेल्वे आणि लक्झरी बसद्वारे कोलकाता गाठले आहे. अहिल्यानगरसह मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथून हे कारागीर रवाना झाल्याने येथील सुवर्ण कारखाने ओस' पडले आहेत. हे कारागीर ४ मे नंतर परततील असे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष किती जण कामावर रुजू होतील, याबद्दल सुवर्ण पेढ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे. { नक्षीकाम: सोन्याच्या तारांपासून बनवले जाणारे नाजूक आणि पारंपरिक दागिने. { कास्टिंग ज्वेलरी: साच्यातून तयार होणारे आधुनिक दागिने. {टर्किश आणि राजकोट: सध्या ट्रेंडमध्ये असलेले हे दागिने वेळेत मिळणे आता कठीण आहे. { पारंपरिक हार व झुमके: हाताने तयार केल्या जाणाऱ्या दागिन्यांचे फिनिशिंग काम रेंगाळले आहे. सुवर्ण व्यावसासिकांना फटका बसणार ^पश्चिम बंगालचे सर्वाधिक कारागीर सोन्याच्या व्यवसायात आहेत. हे कारागीर मतदानासाठी मालकांना न सांगताच निघून गेले आहेत. लग्नसराईच्या ऑर्डर्स आधीच घेतल्या गेल्या आहेत, पण कारागीर नसल्याने ग्राहकांना वेळेत दागिने देणे आता अशक्य आहे. अनेक व्यावसायिकांना ऑर्डर्स रद्द कराव्या लागतील, ज्याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.' - संतोष वर्मा, राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय सुवर्णकार समाज.
अहिल्यानगर तालुक्यातील भातोडी-पारगाव येथे केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजना अपयशी ठरल्याचे वास्तव समोर आले. तापमानाचा पारा चाळीस अंशावर असताना, गावातील नळ कोरडे असून, पाण्याच्या टाक्या रिकाम्या आहेत. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. ग्रामस्थांनी आंदोलनाचा पावित्रा घेतल्यानंतर, प्रशासनाने, लीकेज दुरुस्त केल्यानंतर टाकीत पाणीपुरवठा सुरू होईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे यापूर्वी प्रशासन गंभीर का नव्हते असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. हर घर जल' या योजनेचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवणे हा असला, तरी भातोडी पारगावमध्ये महिलांना आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ही योजना केवळ कागदावरच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गेल्या दोन वर्षांपासून गावात नियमित पाणीपुरवठा सुरू व्हावा यासाठी सरपंच विक्रम गायकवाड यांनी गावकऱ्यांसह सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही योजना अद्याप अपूर्णच असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. कामे तत्काळ सुरू करा, अशी मागणी लावून धरली. ग्रामस्थांनी प्रशासनाला अंतिम आठ दिवसांची मुदत दिली असून, या कालावधीत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी सरपंच विक्रम गायकवाड, उपसरपंच राजू पटेल, ग्रामपंचायत सदस्य सुभाष कचरे, कैलास गांगर्डे, जालिंदर लबडे, गोविंद लबडे, सिराज पटेल, माजी सरपंच विक्रम लबडे, अजिनाथ शिंदे, सभापती संदीप गुंड आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधी जि.प. फोडली, आता टाळे ठोकणार जलजीवन योजनेच्या निकृष्ठ काम केल्या प्रकरणी, यापूर्वी प्रकाश पोटे यांनी १८ जानेवारी २०२४ रोजी जि.प. कार्यालयातील पाणीपुरवठा विभाग कार्यालय फोडले होते. आता त्यांनी भातोडी पाणी योजना आठ दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर जि.प. कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
आजची तरुण पिढीच नव्हे तर एकूणच समाजमन एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) या मायावी समस्येशी संघर्ष करत आहे. या तंत्रज्ञानाने अनेकांचे काम हिरावून घेतले गेले आहे. चुकीच्या व्हिडिओद्वारे समाजमन कलुषित केले जात आहे पण या धोक्यातून वाचण्याचा उपाय राम कथेत आहे. तरुण पिढीने किंबहुना सर्वांनीच रामचरित मानस वाचले तर रामायण काळातील मायावी शक्तींना प्रभू श्रीरामांनी कसे नेस्तनाबूत केले याचे दाखले त्यात आहेत. मानवी जीवनातही अशा अनेक समस्या प्रत्येकाला येतात पण त्यामुळे हतबल न होता समर्थपणे त्यांचा सामना करण्याचा संदेश रामायणातून दिला गेला आहे असे प्रतिपादन व्याख्याते डॉ. कुमार विश्वास यांनी केले. माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आमदार संग्राम जगताप व सचिन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काका ट्रस्टच्यावतीने डॉ. विश्वास यांची अपने अपने राम ही राम कथा आयोजित केली होती. कथेचे तिसरे पुष्प गुंफून समारोप करताना डॉ. विश्वास यांनी प्रभू श्रीरामांनी अनेक संकटांशी झुंज देत यश मिळवताना मानवी जीवनातही संकटांशी सामना करून यशस्वी होण्याचा संदेश दिला. नगरकर भाविकांना तीन दिवस राममय करून रामकथेची अद्भुत पर्वणी दिल्याबद्दल कथाकार डॉ. कुमार विश्वास यांचा सचिन जगताप व आ. संग्राम जगताप यांनी भगवान श्रीकृष्णांची मूर्ती देऊन सन्मान केला. राष्ट्रीय पाठशाळेच्या मैदानावर गेल्या तीन दिवसांपासून ही राम कथा भक्तिपूर्ण वातावरणात आयोजित केली होती. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते श्रीराम मूर्तीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास हभप जंगलेशास्त्री महाराज, आ. मोनिका राजळे, आ.हेमंत ओगले, डॉ. सुजय विखे, मनपा आयुक्त यशवंत डांगे, समर्थ भक्त मंदारबुवा रामदासी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक वाल्मीक कुलकर्णी आदी उपस्थित होते. काका ट्रस्ट व जगताप परिवाराच्यावतीने सुवर्णा जगताप, शीतल जगताप, डॉ. वंदना फाटके, राजेश भंडारी, अनिल मुरकुटे, गणेश गोंडाळ, नगरसेवक विकी जगताप, अजित जगताप, अनुप काळे, शशीकांत घीगे आदींनी सर्वांचे स्वागत केले. डॉ. विश्वास म्हणाले,श्रीरामांनी कोणतेही देवत्व न दाखवता फक्त मानवी जीवनातील समस्या मिटवण्यासाठी कसा संघर्ष आवश्यक आहे हे आपल्या आदर्श जीवनातून दाखवून दिले. त्यांनी वनवास स्वीकारला, काट्याकुट्यातून मार्ग शोधला, बलाढ्य शत्रूशी लढताना वनवासी लोकांचे सहाय्य घेतले, शत्रूचा शरण आलेला भाऊ बिभीषणला लंकाधिश करण्याचे वचन दिले, शत्रूशी लढताना भावाचे व मित्रांचे सहाय्य घेतले आणि सर्वात महत्त्वाचे स्वतःच्या क्षमतेवर व शौर्यावर विश्वास ठेवला. मानवी जीवनातही अशा अनेक समस्या प्रत्येकाला येतात पण त्यामुळे हतबल न होता समर्थपणे त्यांचा सामना करण्याचा संदेश रामायणातून दिला गेला आहे, असे डॉ. विश्वास यांनी नमूद केले. ..तर आधी तुम्ही सत्य स्वीकारा सध्याच्या काळात प्रत्येकाची उपयोगिता पाहिली जाते व त्यामुळेच वृद्धाश्रम वाढत असल्याचे दुर्दैव आहे. तुम्ही आई-वडिलांसोबत राहिले नाही तर तुमची मुलेही तुमच्या समवेत राहणार नाहीत. हितसंबंध व सत्य स्वीकारण्याची वेळ आली तर सत्य स्वीकारा. स्वतः भगवान श्रीरामांनी त्यांच्या जीवनातून हे दाखवून दिले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यावरील हल्ल्याचा ग्रामस्थांनी सभा घेत व्यक्त केला निषेध
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा प्रवरा सहकारी बँकेचे माजी संचालक रमेश भीमराव पन्हाळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे पंचक्रोशीत संतापाची तीव्र लाट उसळली आहे. शुक्रवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास सहा जणांनी पन्हाळे यांना अडवून शिवीगाळ, दमदाटी आणि बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांच्या खिशातील २५ हजार ४०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी पन्हाळे यांनी काही अवैध व्यवसायिकांविरोधात पोलिसांत तक्रारी दिल्या होत्या. त्याचाच राग मनात ठेवून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा नियोजित हल्ला करण्यात आल्याची चर्चा ग्रामस्थांत सुरू आहे. पंचक्रोशी ग्रुप सोसायटीसमोर आयोजित सर्वपक्षीय निषेध सभेत ग्रामस्थांनी सांगितले की, अवैध धंद्यांविरोधात भूमिका घेणाऱ्यांना लक्ष्य करण्याचे प्रकार आता वाढले आहेत. वाळू माफिया, अवैध दारूविक्री आणि इतर बेकायदा धंद्यांमुळे गावोगावी असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहेत. सभेत वक्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, गावातील शांतता उद्ध्वस्त करणाऱ्या अवैध धंदेवाल्यांचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे, अन्यथा पंचक्रोशीतील जनतेचा उद्रेक अटळ आहे. प्रवरा शिक्षण संस्थेचे संचालक ॲड. अप्पासाहेब दिघे, बाळकृष्ण चोरमुंगे, राजू अनाप, प्रताप कडू, योगेश चोरमुंगे, बिपीन ताठे यांनी भाषणातून प्रशासनाला धारेवर धरले. या निषेध सभेला प्रा. बाळासाहेब दिघे, संतोष अंत्रे, नारायण धनवट, पाराजी धनवट, प्रमोद नालकर, योगेश पलघडमल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रमेश पन्हाळे यांच्या घरी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. हल्लेखोरांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करा,असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प, पाचोरा अंतर्गत आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे व प्रकल्प अधिकारी संपदा संत यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर येथे ‘पोषण पंधरवडा’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. या प्रसंगी सरपंच सुनंदा क्षीरसागर, श्री समर्थ गोविंद मंदिर संस्थानचे शिवानंद महाराज, शशिकांत महाराज, पुजारी मनोज साखरे, पिंपळगाव बीटच्या सुपरवायझर नंदा कोतवाल आणि जिल्हा समन्वय सुनंदा गावित यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध स्टॉल्स आणि खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाट्याचे सादरीकरण करण्यात आले, अंगणवाडी सेविका आणि मातांनी नाटकाच्या माध्यमातून मुलांचा मोबाईलचा वापर कमी करण्याचा संदेश दिला. पिंपळगाव हरेश्वरमधील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी या कार्यक्रमाचे चोख नियोजन केले होते. कार्यक्रमाला ग्रामस्थ, आजी-आजोबा आणि माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी दैनंदिन जीवनात पारंपारिक खेळ आणि गोष्ट वाचन अत्यंत आवश्यक आहे असा संदेश या माध्यमातून देण्यात आला. विविध खेळांतून राबवले उपक्रम.. लगोरी, लंगडी, पकडापकडी, संगीत खुर्ची आणि मनोरा रचणे यांसारख्या पारंपरिक खेळांतून मुलांचा उत्साह वाढवण्यात आला. तसेच पोषण आहार प्रात्यक्षिक, मेंदूचे जाळे, मणी ओवणे आणि चित्रावरून गोष्ट सांगणे असे उपक्रम राबवण्यात आले.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या आकाश मोरेंनी माघार घेतली असली तरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार निवडणूक रिंगणात असून आज (गुरुवारी 23 एप्रिल) त्यासाठी मतदान होत आहे. निवडणुकीत प्रामुख्याने सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) विरोधात राघू घुटुकडे (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी), सतीश कदम (हिंदुस्थान जनता पार्टी), करुणा धनंजय मुंडे (अपक्ष) व अभिजित बिचुकले (अपक्ष) यांच्यात प्रमुख लढत होईल असे चित्र आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत निवडणूक निरीक्षक व अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. राहुरी पोटनिवडणुकीसाठी 7 उमेदवारांत लढत होणार राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे रिंगणात आहेत. 4 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागेल. शरद पवार पहिल्यांदाच मतदानापासून वंचित 1962 पासून प्रत्येक निवडणुकीत बारामतीत मतदान करणारे शरद पवार हे या वेळी तब्येतीच्या कारणाने मतदानासाठी उपस्थित राहणार नाहीत. मुंबईत उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे बारामतीच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच ते मतदान करणार नाहीत. मुंबईतून मतदान करण्यासंदर्भात प्रयत्न केले पण ते शक्य होऊ शकले नाही, असे पवारांनी म्हटले आहे. त्यांनी आवाहन करून सून आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला आहे. सुनेत्रा पवारांना किती मते पडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उन्हाचा कडाका लक्षात घेता मतदान केंद्रांबाहेर मंडपांची व्यवस्था करण्यात आली आहे. रांग मोठी झाल्यास मतदारांना वेटिंगरूममध्ये बसवून क्रमाक्रमाने केंद्रात सोडले जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी दिली. प्रत्येक 10 केंद्रांमागे एक रुग्णवाहिका आणि प्रथमोपचारासाठी अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना साहित्य थेट केंद्रावरच उपलब्ध करून दिल्याने त्यांचा वेळ वाचला आहे. दरम्यान, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी, शौचालय आणि सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. या 12 पर्यायी कागदपत्रांवर करता येईल मतदान ज्या मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र नाही, त्यांना निवडणूक आयोगाने 12 पर्यायी कागदपत्रांना मान्यता दिली आहे. यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत ठेवल्यास मतदान करता येईल : आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्टाचे फोटो असलेले पासबुक आणि इतर 6 अधिकृत कागदपत्रे. राहुरी मतदारसंघाचा लेखाजोखा एकूण मतदार: 3,33,545 पुरुष मतदार: 1,72,231महिला मतदार: 1,61,312 एकूण मतदान केंद्रे: 374 170 पैकी 163 जणांनी केले होम मतदान'' राहुरी निवडणुकीसाठी 36 पोलिस अधिकारी, 708 पोलिस कर्मचारी आणि 391 होमगार्ड तैनात आहेत. 34 सेक्टर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, मतदान संपल्यानंतर साहित्य संकलनाची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. 85 वर्षांवरील वृद्ध आणि दिव्यांगांसाठी होम मतदान'' सुविधेअंतर्गत 170 पैकी 163 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. हिंगोली विधानसभेचे भाजपाचे माजी आमदार बळीराम पाटील कोटकर (85) यांचे अल्पशः आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर गुरुवारी ता. 23 दुपारी तीन वाजता त्याच्या मुळ गावी भानखेडा (ता. सेनगाव) येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनाने भाजपाचा सच्चा कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील रहिवासी असलेले माजी आमदार बळीराम पाटील कोटकर हे जिल्हयात बापू या नावाने परिचीत होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावा मुळे त्यांचा जिल्हाभरात दांडगा जनसंपर्क होता. भाजपाचे तत्कालीन नेते प्रमोद महाजन, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. हिंगोली विधानसभेसाठी भाजपाने त्यांना 1990 साली उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळविला होता. त्यानंतर 1995 च्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळविला होता. दोन वेळा त्यांनी हिंगोली विधानसभेचे नेतृत्व केले. अत्यंत करारीबाणा असलेले नेतृत्व म्हणून त्यांची शासन दरबारी ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी हिंगोली विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली. हिंगोली जिल्हा निर्मितीमध्येही त्यांचे मोठे योगदान होते. कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असत त्यामुळे हिंगोली येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांचा नेहमीच राबता असायचा. मागील काही दिवसांपासून ते वृध्दापकाळामुळे आजारी होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर त्यांच्या मुळगावी भानखेडा येथे दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, चार नातू, 4 मुली, सुना असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने भाजपाचा सच्चा कार्यकर्ता हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने हिंगोली विधानसभा मतदार संघावर शोककळा पसरली आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या आकाश मोरेंनी माघार घेतली असली तरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार निवडणूक रिंगणात असून आज (गुरुवारी 23 एप्रिल) त्यासाठी मतदान होत आहे. निवडणुकीत प्रामुख्याने सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) विरोधात राघू घुटुकडे (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी), सतीश कदम (हिंदुस्थान जनता पार्टी), करुणा धनंजय मुंडे (अपक्ष) व अभिजित बिचुकले (अपक्ष) यांच्यात प्रमुख लढत होईल असे चित्र आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राहुरी पोटनिवडणुकीसाठी 7 उमेदवारांत लढत होणार राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे रिंगणात आहेत. 4 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागेल.
शहरासाठी जीवनदायी मानल्या जाणाऱ्या पुनद पाणीपुरवठा योजनेत आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ४६ कोटी मूळ किंमत असलेली ही योजना थेट ५२ कोटीपर्यंत वाढविण्यात आल्याचा गंभीर आरोप सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने केला आहे. योजनेचे आतापर्यंत झालेले कामही निकृष्ट असून, या योजनेच्या कामाची नामांकित संस्थेतर्फे गुणवत्ता तपासावी व सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शहराध्यक्ष भारत काटके व शहर कार्याध्यक्ष मनोज सोनवणे यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे उर्वरित पान ३ योजनेतील अनेक कामे निकृष्ट असून जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या आणि वितरण व्यवस्था आजही पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत. परिणामी, कोट्यवधी रुपये खर्चूनही नागरिकांना अपेक्षित पाणीपुरवठा मिळत नाही. योजनेच्या कामातील तब्बल ९० टक्के बिले काढण्यात आली असून, प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण व दर्जाहीन असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.
बागलाण तालुक्यातील ताहराबाद येथे गावातील रखडलेला पाणीपुरवठा व स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे पदाधिकारी मिलिंद चित्ते यांनी सोमवारी (दि. २०) उपोषण सुरू केले होते. सायंकाळी संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदारांनी उपोषणस्थळी भेट देऊन मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्याने उपोषण मागे घेण्यात आले, अनेक दिवसांपासून ताहराबाद गावातील पाणीपुरवठा आणि स्मशानभूमी रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. जलजीवन विभागाचे अधिकारी व ठेकेदारांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळतन सल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. या प्रश्नांवर अनेकदा पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे तोंडी तसेच लेखी तक्रारी करूनही तोडगा न निघाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात आला. या सामाजिक मुद्याला ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल पाटील, शिवसेनेचे सुभाष नंदन, आदिवासी परिषदेचे प्रवीण पवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन समर्थन व्यक्त केले. खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. उपोषणाची दखल घेत जलजीवन विभागाचे अधिकारी, ठेकेदार तसेच पंचायत समितीचे अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी सहा महिन्यांत गावात नवीन विहीर खोदून पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच स्मशानभूमी रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर मिलिंद चित्ते यांनी सायंकाळी लिं बूपाणी घेऊन उपोषण मागे घेतले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक प्रश्नांसाठी शासनदरबारी लढा सुरू ठेवणार लेखी आश्वासन मिळाल्यामुळे गावातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास निर्माण झाला आहे. ग्रामस्थ समाधान व्यक्त करत असून, आगामी काळातही सामाजिक प्रश्नांसाठी शासनदरबारी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. - मिलिंद चित्ते, उपोषणकर्ते
हरसुल अक्षय्य तृतीयेनिमित्त वायघोळ येथे रंगलेल्या कुस्ती दंगलीत नाशिकमधील सोमनाथनगरचा मल्ल तुकाराम बेंडकोळी याने खुल्या गटात प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवत मानाची गदा पटकावली. विशेष म्हणजे, या दंगलीत प्रथमच सहभागी झालेल्या चार महिला पहिलवानांच्या झुंजार खेळीने कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. नाशिक, दिंडोरी, इगतपुरी आणि पालघर जिल्ह्यातील सुमारे २५० कुस्तीपटूंनी या स्पर्धेत शड्डू ठोकला होता. तीन गटांत झालेल्या या लढतींमध्ये रोख रकमेसह घरगुती वापराची स्टीलची भांडी बक्षीस म्हणून देण्यात आली. स्थानिक गटात हरी करवले आणि वसंत महाले यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत मानाची गदा उंचावली. नाशिक जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. यावेळी चेतन बलकवडे, अशोक जाधव, अमृता शिंदे यांसारख्या दिग्गज मल्लांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला. सलग दुसऱ्या वर्षी जिल्हा तालीम संघाच्या सहकार्याने वायघोळ पंच मंडळ, ग्रामस्थ, सुरेश अण्णा जाधव, हरसूल व्यापारी असोसिएशन आणि कुस्तीप्रेमींनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वायघोळ येथे सुरू असलेल्या कुस्त्या व उपस्थित कुस्तीप्रेमी नागरिक. महिला कुस्तीपटू ठरल्या आकर्षणाचे केंद्र या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महिला कुस्तीपटूंचा सहभाग. पंचांनी महिलांसाठी दोन विशेष कुस्त्यांचे आयोजन केले होते. महिला मल्लांनी लावलेले 'डाव-प्रतिडाव' पाहून उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांच्या कौशल्यावर खूश होऊन अनेक प्रेक्षकांनी कुस्ती सुरू असतानाच महिला खेळाडूंना रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहित केले.
पेहेचान प्रगती फाउंडेशन, मुंबईच्या सहकार्याने आवळखेडवाडी जिल्हा परिषद शाळेत पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पेहेचान प्रगती फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रगती अजमेरा यांच्या पुढाकारातून शाळेसाठी अंडरग्राऊंड पाण्याची टाकी उभारण्यात आली. या टाकीसाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सढळ हाताने मदत केली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या या वाडीतील विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे. धामडकी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या पूर्णत्वास गेला आहे. पाण्याच्या टाकीसाठी आवश्यक पाणीपुरवठा रचना माखरिया यांच्या सौजन्याने टँकर सुविधेद्वारे उपलब्ध करून देण्यात आला. पेहेचान प्रगती फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रगती अजमेरा व उपस्थित सदस्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यानिमित्त विद्यार्थ्यांना पाहुण्यांकडून आमरस व पुरणपोळीचे जेवण देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला पेहेचान प्रगती फाऊंडेशनच्या सदस्या गुरुदेव दुहरा, ग्याना डालमिया, हर्षा संजय सोनी, भारती पतंगिया, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास पवार, मधुकर रोंगटे, मारुती कुंदे, प्रकाश ठाकरे, यांच्यासह ग्रामस्थ, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा पिढीत व्यसनाधीनता वाढली आहे. त्यामुळे कुटुंब संस्था उद्ध्वस्त होत आहे. तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे. कुटुंब व देशाचे कल्याण साधावे, असे आवाहन गोपाल चैतन्य महाराज यांनी वडनेर येथील श्री रामदेव बाबाजी कथा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी केले. वडनेरला बंजारा समाजाच्या अखिल भारतीय चैतन्य साधक परिवारातर्फे श्रीराम रामदेवजी बाबा जीवन कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. समारोपप्रसंगी गोपाल चैतन्य महाराजांचे कीर्तन झाले. मोबाइलचेही व्यसन वाढले आहे. त्यामुळे युवा पिढी बेकारीत ढकलली जात आहे, असे ते म्हणाले. शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष न दिल्यास युवा पिढी बरबाद होईल. वेळीच दक्षता घ्यावी, युवकांनी सावरावे, आपली उन्नती साधावी, असे त्यांनी सांगितले. या वेळी आमदार संजना जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद, नगरसेवक अब्दुल जावेद, मंत्री गिरीश महाजन, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे, मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, माजी खासदार हरिभाऊ राठोड, गोकुळ राठोड, मनोज पवार, आकाश बोलधने, संतोष कोल्हे, माजी आमदार नितीन पाटील, उपसभापती जयेश बोरसे, डॉ. मनोज राठोड आदी उपस्थित होते. अखंड हरिनाम सप्ताहात योगी दत्त नाथ महाराज, विनोद वडनेरकर, तुकाराम महाराज जेऊरकर, सुरेश आढाव चिंचोलीकर, हरीश हर्षानंद महाराज मथुरा यांची कीर्तने झाली. या वेळी सामूहिक विवाहही झाला. सेवालाल महाराजांचे स्मारक उभारू ः अब्दुल जावेद कन्नड शहरात सेवालाल महाराजांचे यथोचित स्मारक उभे करू, अशी घोषणा नगरसेवक अब्दुल जावेद यांनी केली. जिल्हाभरातून बंजारा समाज मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होता. चैतन्य महाराज यांनी आभार मानले.
वेरूळ जैन गुरुकुलमध्ये मेळावा:600 माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती
पार्श्वनाथ ब्रह्मचर्य आश्रम जैन गुरुकुल वेरूळमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा २० एप्रिल रोजी उत्साहात झाला. एक दिवसीय मेळावा दोन सत्रांत झाला. एकूण ६०० माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदवली होती. संस्थेचे मार्गदर्शक वर्धमान जी पांडे, अध्यक्ष दिनेश गंगवाल, कोषाध्यक्ष सुमित ठोले, सहकोषाध्यक्ष गौतम ठोले, शालेय समितीचे अध्यक्ष मदनलाल पांडे, निर्मलकुमार ठोले, मुख्याध्यापक गुलाबचंद बोराळकर, पर्यवेक्षक डॉ. सुकुमार नवले यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा पार पडला. सुरुवातीला आचार्य समंतभद्र महाराज, आचार्य आर्यनंदी महाराज, आचार्य विद्यासागर महाराज यांच्या प्रतिमेसमोर उद्योजक अजित इंगलवार, संस्था अध्यक्ष दिनेशकुमार गंगवाल, महामंत्री डॉ. प्रेमचंद जी पाटणी, इतर पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. पहिल्या सत्रात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रेमचंद पाटणी, बाहुबली काक्रंबे, पुरुषोत्तम पानपट, कन्हैया लाल दीडपोळे, रमेश घोडके, पंकज कवडे, वर्धमान पाटणी, प्रफुल्ल शहा, पृथ्वीराज नवले उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात निर्मलकुमार ठोलिया, अजितकुमारजी शहा, अॅड. संतोष भोसे, सचिन चतुर, प्रशांत वानरे, पंकज बांडे, केतन शेटे, धीरज पाटणी, प्रशांत गडेकर, कैलास कांबळे, गिरीश संघई यांची उपस्थिती होती. १९६२ पासूनचे अनेक माजी विद्यार्थ्यांनी गुरुकुलातील निवासी जीवनातील अनुभव सांगितले. प्रतिकूल परिस्थितीत प्रवेश दिला. कमी फीमध्ये शिक्षणाची संधी दिली. चांगले संस्कार दिले. त्यामुळेच आज समाजात उभे आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दुष्काळमुक्तीसाठी प्रत्येक गावात जलसंधारणाचा सप्ताह राबवा, असे प्रतिपादन प्रा. पुरुषोत्तम वायाळ यांनी केले आहे. वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे आयोजित तांबे सर फाउंडेशन आयोजित जलतारा प्रात्यक्षिक कार्यशाळा मार्गदर्शन कार्यक्रमात प्रा. पुरुषोत्तम वायाळ यांनी दुष्काळमुक्तीसाठी जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले. या वेळी बोलताना ते म्हणाले, पाणी हीच खरी संपत्ती असून, प्रत्येक गावाने जलसंधारणाचा सप्ताह राबवून पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला चालना दिली पाहिजे. त्यांनी उपाययोजना करून पाणी जमिनीत मुरवण्याचे आवाहन केले. जलतारा उपक्रमामुळे अनेक गावांमध्ये पाण्याची पातळी वाढून शेतीला मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कडक उन्हाळ्यातही पिके टिकवण्यासाठी जलसंधारण हा एकमेव प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जलसंधारण ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी शेतकऱ्यांना शेतात पाणी मुरवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्याचे आवाहन केले. जलतारा उपक्रमामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी वाढून शेतीला मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी आमदार रमेश बोरनाणारे, जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, दत्तू पाटील, रिखब पाटणी, पंचायत समिती सदस्य परिगाबाई पवार, राजेंद्र निकम, आनंद निकम, प्रमोद जिवरग, सुरेश काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी संजय निकम यांनी डोंगरथडी भागातील चांदेश्वरी प्रकल्प, मन्याड धरणाची उंची वाढवण्याबाबत उपाययोजना याकडे आमदार बोरनारे यांच लक्ष वेधले. या वेळी बोलताना आमदार रमेश बोरनारे यांनी येथून पुढे वैजापूर एमआयडीसी, पाणी प्रश्नावर काम करणार असल्याचे सागितले. जलतारा कार्यक्रमास ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. पुरुषोत्तम वायाळ यांच्या मार्गदर्शनामुळे जलसंधारणाबाबत जनजागृती करून लोणी खुर्द गाव भविष्यात दुष्काळमुक्तीसाठी सर्वतोपरी काम करणार, असा निर्धार सचिन तांबे यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील फळबागांना पाणीटंचाईचा फटका बसू लागला आहे. मोसंबीच्या बागा सुकण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यातील निम्म्या भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. धरणपट्ट्यातील बागा जीव धरून उभ्या आहेत. चार वर्षांनंतर मोसंबीला पाणीटंचाईचा फटका बसत आहे. तालुक्यातील पाचोड भागातील २ हजार फळबागांना हा फटका अधिक जाणवत आहे. मुरमा येथील शेतकऱ्याला मोसंबी बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे. अप्पासाहेब नारायण मानमोडे, बजरंग मानमोडे यांनी कष्टाने उभी केलेली तीन एकरांतील बाग पाण्याअभावी सुकू लागल्याने त्यांनी स्वतःच्या हाताने झाडे तोडण्याचा निर्णय घेतला. पाचोडसह बालानगर, आडूळ भागातही हीच स्थिती निर्माण झाली आहे. पैठण तालुका मोसंबीचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. पाचोड येथील मोसंबी मार्केट ही परिसरातील प्रमुख बाजारपेठ आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील शेतकरी येथे मोठ्या प्रमाणात मोसंबी विक्रीसाठी आणतात. गोड, रसाळ मोसंबीमुळे या भागाने राज्यासह परदेशी बाजारपेठेतही ओळख निर्माण केली आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीने फळबागांचे मोठे नुकसान झाले. यंदा दुष्काळाने दुहेरी संकट उभे केले आहे. दीर्घकाळ पाऊस न पडल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. कडक उन्हामुळे बागांना पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. मानमोडे बंधूंनी २०१५ मध्ये कर्ज काढून मोसंबी बाग लागवड केली होती. २०२० पासून उत्पादन सुरू झाले होते. गेल्या दोन वर्षांत टँकरने पाणी देऊनही झाडे वाचली नाहीत. अखेर संपूर्ण बाग तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. या संकटात सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. सध्या मजुरी करून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. पाचोड, आडूळ, मुरमा परिसरासह तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची स्थिती याचप्रमाणे बिकट झाली आहे. शासनाने तत्काळ पंचनामा करावा, आर्थिक मदत द्यावी, कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ठिबकचा वापर करावा यंदा पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ठिबकद्वारे फळबागांना पाणी द्यावे, जेणेकरून कमी पाण्याचा योग्य त्या प्रमाणात वापर होईल आणि फळबागा नष्ट होणार नाहीत, अशी माहिती पैठण तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी दिली.
तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समितीत जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जलजीवन मिशन, घरकुल योजना, रोजगार हमी योजनेतील कथित घोटाळ्यांवर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. रोजगार हमीतील बोगस बिले, घरकुलासाठी अडवणूक, जलजीवनमधील बोगस कामे या मुद्द्यांवर बैठक गाजली. बैठकीला राजेंद्र जैस्वाल, सचिन गरड, अनिता मोटे, बालाजी सोनटक्के, सभापती वैशाली बोंबले, शिवराज भुमरे, गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड, दादा गलांडे, विनोद बोंबले, प्रियंका भुजंग आदी उपस्थित होते. तालुक्यात पाणीटंचाई असताना केवळ पाच टँकरवर व्यवस्था सुरू असल्याचे सांगण्यात आले. आणखी गावांचे प्रस्ताव प्रलंबित असतानाही अधिकारी ठोस माहिती देत नसल्याने संताप व्यक्त झाला. भूजल अधिकारी हजर नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचे सदस्यांनी सांगितले. “आता तरी जागे व्हा, नाहीतर टंचाई हाताबाहेर जाईल,” असा इशारा देण्यात आला. टँकर मंजूर होतात. पाणी मात्र गायब असल्याचा आरोपही करण्यात आला. जलजीवन मिशनअंतर्गत १६६ पैकी १०१ योजना पूर्ण झाल्याचा दावा प्रशासन करत असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात अनेक गावांत कामे अपूर्ण असल्याचा आरोप झाला. दर्जा निकृष्ट असल्याचे सांगण्यात आले. रस्ते तुटल्याचे मुद्दे मांडले गेले. न झालेल्या कामांची बिले दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. ठेकेदार व अधिकारी संगनमताने कोट्यवधींची लूट झाल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा करत तत्काळ चौकशीची मागणी करण्यात आली. ईसारवाडी, विसामांडवा आदी ठिकाणी जलजीवनची कामे बोगस असल्याचा आरोप झाला. ऑडिटची मागणी करण्यात आली. ग्रामसेवक १५-१५ दिवस गावात फिरकत नसल्याने गावकारभार ठप्प झाल्याचे सांगण्यात आले. नागरिकांची कामे रखडत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. १६,५०० मंजूर घरकुलांपैकी केवळ २ हजार ४०० पूर्ण घरकुल योजनेत १६,५०० घरकुल मंजूर असताना २,४०० पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. ही आकडेवारी व्यवस्थेचे अपयश दाखवणारी असल्याचे जि.प. अध्यक्ष गलांडे यांनी सांगितले. स्थानिक सदस्यांनी लाभार्थ्यांकडून प्रत्येकी २ ते ५ हजार रुपये उकळले जात असल्याचा आरोप केला. “घरकुलासाठी गरीबांची सर्रास लूट” सुरू असल्याचेही सांगण्यात आले. ...तर गुन्हे दाखल करू बैठकीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक गलांडे यांनी सांगितले की, “चार वर्षांत मोठे घोटाळे झाले. आता याची सफाई करणारच.” घोटाळे सिद्ध झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांन ी मनाची लाज ठेवून काम करावे, अन्यथा कठोर कारवाई अपरिहार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
वाळूज परिसरातील एक लघुउद्योजक बुधवारी (22 एप्रिल) सकाळी देवपूजा आटोपून कारखान्यात निघून गेले आणि त्यांच्या घरात शिरलेल्या प्रेयसीने त्यांच्या पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली. झटापट होताच आरोपीने डोळ्यावर स्प्रे फवारून हा खून केला. साधना महेंद्र सोनपेठकर (38, रा. साईश्रद्धा पार्क, वडगाव कोल्हाटी) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शैला सुनील सोनार ( 44, रा. बजाजनगर) हिला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सोनपेठकर हे वाळूज भागात उद्योग चालवतात. आरोपी शैला सोनारने त्यांच्या घरात शिरताच दाराला आतून कुलूप लावले व पिस्तूल काढले. या वेळी साधना यांना वाचवण्यासाठी सासू केशरबाई सरसावल्या. त्यांनी शैलाचे पिस्तूल हिसकावून खिडकीबाहेर फेकले. मात्र, शैलाने त्यांच्या डोळ्यावर स्प्रे मारून नंतर साधना यांच्यावर वार केले. उद्योजकाला 16 वर्षे त्रास महेंद्र आणि शैला यांची ओळख 2009 मध्ये एका कंपनीत झाली होती. आरोपी शैलाने महेंद्रला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन आतापर्यंत 36 लाख उकळल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. महिनाभरापूर्वी शैला जबरदस्तीने महेंद्रच्या घरी राहायला आली, तेव्हा पोलिसांनी तिला बाहेर काढले होते. खुनानंतर रचला फाशीचा बनाव हत्येनंतर शैला एक तास घरातच होती. तिने बाथरूममध्ये रक्ताने माखलेले हात आणि चाकू धुतला. काही घडलेच नाही अशा थाटात ती फोनवर बोलत बसली. केशरबाईंच्या ओरडण्यामुळे नागरिक जमा झाले. पोलिस येणार असल्याचे समजताच शैलाने फाशी घेण्याचा बनाव रचला. पोलिसांनी सब्बलच्या साह्याने दरवाजा तोडला आणि शैलाला ताब्यात घेतले. ‘आई वाचवा... आई वाचवा...’ म्हणत होती, पण मी हतबल होते सकाळी माझा मुलगा महेंद्र देवपूजा आटोपून कारखान्यात गेल्यावर शैला आली. तिनं सोबत कुलूप आणलं होतं. घरात येताच तिनं दाराला आतून कुलूप लावलं. मी विचारलं, “हे काय करतेस?’ तर तिने सरळ पर्समधून पिस्तूल काढलं. सून साधना घाबरली, तिने महेंद्रला फोन लावला. पण शैला चवताळली होती. मी हिंमत केली आणि झडप घालून ते पिस्तूल हिसकावून खिडकीबाहेर फेकलं. मला वाटलं आता आम्ही वाचू, पण त्या राक्षसिणीनं डोळ्याचं पातं लवतं ना लवतं तोच आमच्या तोंडावर काहीतरी फवारलं. समोर सगळं अंधारून आलं. त्या वेळी मला साधनाच्या किंकाळ्या ऐकू आल्या. साधना रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होती, “आई वाचवा... आई वाचवा...” म्हणत होती...
मालेगाव 2006 स्फोटातील चौघे निर्दोष:4 स्फोट, 31 बळी... पुरावेदेण्यात एनआयएला अपयश
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे 8 सप्टेंबर 2006 मध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने या प्रकरणातील चारही आरोपींना दहशतवादासह (यूएपीए) सर्व आरोपांतून दोषमुक्त केले आहे. तब्बल 19 वर्षांनंतर आलेल्या या निकालामुळे 31 निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या या साखळी स्फोटांसाठी नेमके जबाबदार कोण? हा प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरित राहिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. राजेंद्र चौधरी, धान सिंह, मनोहर नरवरिया आणि लोकेश शर्मा या आरोपींवर खून, गुन्हेगारी कट रचणे आणि ‘यूएपीए’ या कठोर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले होते. त्याला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. सुनावणीदरम्यान अपुरे पुरावे सादर केले गेले तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सुनावणीदरम्यान एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सादर करता आला नाही. या आधारावर खंडपीठाने चौघांना आरोपांतून मुक्त केले. बडा कब्रस्तान, मशिदीजवळ झाले होते स्फोट मालेगाव शहरात शब - ए - बारातच्या दिवशी 8 सप्टेंबर 2006 रोजी दुपारी 1.45 वाजेदरम्यान बडा कब्रस्तान व हमीदिया मशिदीजवळ नमाज संपत असताना सलग चार स्फोट झाले होते. हल्लेखोरांनी सायकलींवर बॉम्ब ठेवले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू झाला होता, तर 312 जण गंभीर जखमी झाले होते. निकालास सुप्रीम कोर्टात आव्हान देणार 2008 बॉम्बस्फोटाच्या निकालास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. जमियतच्या वरिष्ठ वकिलांच्या समितीशी चर्चा करुन 2006 च्या स्फोटांबाबतच्या या निकालाविरोधातही सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. - ॲड. शाहिद नदीम, जमियतचे वकील. पुराव्यांच्या अभावामुळे आरोप निश्चितीवर प्रश्न पुराव्यांचा अभाव : ‘एनआयए’ ठोस पुरावा किंवा साक्षीदारही सादर करू शकली नाही यांची गंभीर दखल न्यायालयाने घेतली.दीर्घ कारावास : या चौघांना 2019 मध्येच जामीन मिळाला होता. त्यावेळी उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते की, कोणताही खटला न चालता हे आरोपी 6 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहेत.आरोपनिश्चितीवर सवाल: पुरावे, साक्षीदार नसल्यामुळे आरोपांची पायाभूत रचना कमकुवत ठरल्याचा मुद्दा आरोपींच्या वकिलांनी मांडला होता. यापूर्वीच इतर आरोपींची सुटका झाल्याचा संदर्भ देत हा खटला टिकू शकत नाही, असा युक्तिवाद केला. ... मग बॉम्बस्फोट घडवले कुणी?- जमियत सर्वच निर्दाेष आहेत तर मालेगावात बॉम्बस्फोट कुणी घडवले असा सवाल जमियत उलमा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मौलाना अब्दुल कय्युम कासमी व सचिव डॉ. अखलाख अन्सारी यांनी केला. अन्सारी म्हणाले, 2008 च्या प्रकरणासारखेच याही आरोपींची मुक्तता झाली. स्फोट घडले, निष्पाप बळी गेले. तरीही स्फोट घडवणारे निष्पन्न होत नाही हे तपास यंत्रणेचे अपयश आहे. 2008 प्रकरणात सरकारने अपील दाखल केले नाही. या खटल्यातही सरकार अपील दाखल करणार नाही.
छत्रपती संभाजीनगर शहर अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या हत्याकांडांनी हादरले. एका घटनेत जामिनावर सुटून आलेल्या गुन्हेगाराचा त्याच्याच साथीदारांनी पार्टीच्या बहाण्याने बोलावून ११ वेळा भोसकून खून केला, तर दुसऱ्या घटनेत अनैतिक संबंध व वसुलीच्या वादातून महिलेने थेट घरात घुसून प्रियकराच्या पत्नीचा तिच्या सासूदेखत गळा चिरला. शिवाजीनगर भागात मंगळवारी मध्यरात्री कुख्यात मुकेश साळवे टोळीशी संबंधित करण ऊर्फ रोहित म्हस्के (२३) याची त्याचाच जुना मित्र अक्षय पडूळ याने जुन्या वादातून हत्या केली. लूटमारीच्या गुन्ह्यातून रोहित ४ दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आला होता. हत्येपूर्वी रोहितने ‘नीचे वालों से मैं खुद निपट लूंगा’ असे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले होते. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी ५ आरोपींना बेड्या ठोकल्या, अक्षय फरार आहे. पहारीने दरवाजा तोडून आरोपी महिलेला घेतले ताब्यात दुसरी घटना वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे बुधवारी सकाळी घडली. आरोपी शैला सोनार (४४) हिचे महेंद्र सोनपेठकरशी अनैतिक संबंध व ३६ लाखांच्या वसुलीचा वाद होता. याच रागातून शैला महेंद्रच्या घरात घुसली. तिने घराला आतून कडी लावली व सासू-सुनेच्या डोळ्यांत स्प्रे मारला. नंतर तिने महेंद्रची पत्नी साधनावर (३८) चाकूने सपासप वार करून हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेहासोबत आरोपी महिला एक तास बसून होती. पोलिसांनी पहारीने दार तोडून तिला ताब्यात घेतले.
टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे शोषण करून त्यांना धर्मांतराला प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात आरोपी दानिश शेख याला एसआयटीकडून दुसऱ्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी त्याने अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणात एसआयटीकडून नियुक्त विशेष सरकारी वकील किरण बेंडभर यांनी अटकपूर्व जामिनाला विरोध केला. तर आरोपीच्या वतीने दानिशविरोधातील तक्रारी चुकीच्या असल्याचा दावा करण्यात आला. कोर्टरूम लाइव्ह किरण बेंडभर (सरकारी वकील): आरोपीविरुद्ध बलात्कार, ॲट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्हे असून समाजात पडसाद उमटले आहेत.उमेश वालझाडे (आरोपीचे वकील) : फिर्यादी आणि आरोपी एकाच कंपनीत काम करतात. तेथील वादाचा राग मनात धरून फिर्यादीने हा खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्या दिवशी वाद झाला नाही. जातिवाचक शिवीगाळही झाली नाही.सरकारी वकील : आरोपीने पीडितेशी अश्लील वर्तन केले. ‘मुले होत नसतील तर माझ्याकडे पाठवा’ असे गंभीर वक्तव्य केल्याची तक्रार आहे. दुसरा आरोपी तौफिक खान याचीही भूमिका संशयास्पद असून आरोपीला मोकळे सोडल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो.आरोपीचे वकील : मुळात दोन्ही आरोपी पोलिसांच्याच ताब्यात असून त्यांना पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची गरज नाही.निदासाठी पथके रवाना : मुख्य आरोपी निदा खानचा तात्पुरता अटकपूर्व जामीन न्यायालयाने नामंजूर केल्याने कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. तिच्या शोधासाठी एसआयटीकडून मुंबई, मुंब्रा, पुण्यासह ठिकठिकाणी पथके पाठवली आहेत.
भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सहकुटुंब धीरेंद्र शास्त्रींच्या बागेश्वर धाम येथे गेले. त्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. गवई हे भारतीय राज्यघटनेचे भाष्यकार दिवंगत रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे चिरंजीव आहेत. संविधानाच्या सर्वोच्च खुर्चीवर राहिलेल्या भूषण गवईंनी बागेश्वर धाममध्ये उपस्थिती लावणे हे त्यांच्या वडिलांच्या वैचारिक वारशाशी विसंगत असल्याचे मत पुरोगामी वर्तुळातून व्यक्त होत आहे. अंनिसच्या ‘होम पिच’वरच शह? २०२३ मध्ये नागपुरात धीरेंद्र शास्त्रींचा ‘रामकथा’ कार्यक्रम झाला होता. त्या वेळी अंनिसने त्यांना चमत्कार सिद्धीचे आव्हान दिले होते. त्यांना गवईंनी भेटणे अंनिस समर्थकांना धक्कादायक वाटते. आयुष्यभर घटनात्मक मूल्यांची जपणूक केलेल्या कुटुंबातून अशा पीठांना मान्यता हे बदलाचे वारे आहे का, असे हे समर्थक विचारत आहेत. प्रशांत भूषण संतापले प्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी या भेटीचा फोटो शेअर करत सोशल मीडियावर लिहिले की, त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. एका वादग्रस्त कथावाचकासोबत सार्वजनिकपणे दिसल्यानंतर न्यायमूर्ती गवई न्यायपालिका आणि देशाला कोणता संदेश देऊ इच्छितात? धीरेंद्र शास्त्री यांचा उल्लेख ‘द्वेष पसरवणारे’ असा करत ही भेट न्यायालयीन मर्यादेच्या विरोधात असल्याचे प्रशांत भूषण यांचे म्हणणे आहे.
अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्या कृत्याचे व्हिडिओ व फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या अयानला बुधवारी पोलिसांनी परतवाडा येथे पायी फिरवले. थार वाहनात अयानजवळ दिसलेला मोबाइल पोलिसांना जप्त करायचा होता. मात्र, तो मोबाइल आपण एका मित्राला दिल्याचे सांगत असल्याने त्याला पायी फिरवत हा सीन रिक्रिएट करण्यात आला. दुसरीकडे, अन्य कारवाईत या व्हिडिओतील वाहन आणि पिस्तूलसदृश शस्त्रही पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीच्या हाती दोन दिवसांपूर्वी एक नवा व्हिडिओ लागला. त्यानुसार तो एका कारमध्ये बसलेला दिसत असून त्याच्या शेजारी महागडा मोबाइल, पिस्तूलसदृश वस्तू आणि नोटांचे बंडल ठेवले आहे. ही सर्व सामग्री आता एसआयटीने जप्त केली आहे. वाहनातील पिस्तूलसदृश शस्त्र व कार हे राजेश रोशन प्रजापती (५०, रा. सावळी दातुरा, ता. अचलपूर) यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाल्याने ते त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. अयानने ज्या मित्राला मोबाइल दिला होता, त्याचे घर समरसपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. ते ठाण्यापासून ५० मीटर अंतरावर आहे. गेल्या ११ एप्रिल रोजी परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही मुलींचे अयानसोबतचे १८ अश्लील व्हिडिओ आणि ३९ छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिस अंमलदार नीलेश काळे यांच्या तक्रारीवरून १३ एप्रिल रोजी अयानला व त्याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर सुरुवातीला २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात दोन वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या कोठडीत एक आठवड्याची वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. चौघांनाही २७ पर्यंत पोलिस कोठडी अयान अहमद आणि त्याचे तीन साथीदार उजेर खान, इक्बाल खान, मो. साद इक्बाल खान आणि तरबेज खान मो. साबीर अशा चौघांचीही पोलिस कोठडी २७ एप्रिलपर्यंत लांबली आहे. सहायक सरकारी वकील डी. ए. नवले आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी न्यायालयात अत्यंत प्रभावीपणे आपली बाजू मांडली. सर्व चारही आरोपींची पुन्हा आठवडाभराची पोलिस कोठडी मिळवली. या वेळी अचलपूर न्यायालयाला एक प्रकारे पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, या प्रकरणात दिवसेंदिवस मोठे खुलासे होताना दिसत आहेत. वाहनात पिस्तूलसदृश दिसणारे शस्त्र जप्त केले असले तरी ते पिस्तूलच आहे की नाही, याबाबत एसआयटीचे एकमत झाले नाही. जप्त शस्त्राचा व्यास (बोअर) कमी असल्याचे दिसून येत असल्याने ते शस्त्र अधिक तपासणीसाठी तज्ज्ञांकडे पाठवले जाणार आहे.
देवस्थान जमीन सातबाऱ्यावर वहिवाटदारांचे नाव लागणार:मसुद्यावर हरकती नोंदवण्यासाठी 1 महिन्याचा अवधी
राज्यातील लाखो शेतकरी आणि वहिवाटदारांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला देवस्थान इनाम जमिनींच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भातील नवीन कायद्याचा मसुदा पुढील तीन दिवसांत सार्वजनिक होईल. मसुदा लवकरच जनतेच्या दरबारात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सूचनेनुसार हा सर्वसमावेशक कायदा तयार करण्यात येत आहे. या मसुद्यावर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी जनतेला एक महिन्याचा अवधी दिला जाईल. जुलैमध्ये पावसाळी अधिवेशनात या कायद्याला अंतिम स्वरूप दिले जाईल. नव्या कायद्याचे फायदे
राज्यात पुढील ४ दिवस वादळी वा-यासह गारपीट?
पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्रात पुढील ४ दिवसांत वादळी वा-यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असल्याचे पुण्यातील हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले. राज्यात ४ दिवस दक्षिण विदर्भ, मराठवाडा मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट असल्याचे सानप यांनी सांगितले. दुसरीकडे आज साता-यात आणि पुण्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. सातारा शहरात आणि ग्रामीण भागात पावसाने हजेरी […] The post राज्यात पुढील ४ दिवस वादळी वा-यासह गारपीट? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्य शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणाला अखेर पूर्णविराम
विशेष कोर्टाने स्वीकारला अहवाल, आ. रोहित पवारही निर्दोष मुंबई : प्रतिनिधी राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) घोटाळ््याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांना विशेष सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले. त्यामुळे या प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे. हे प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा आर्थिक गुन्हे शाखेने दाखल […] The post राज्य शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणाला अखेर पूर्णविराम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लखनौ : वृत्तसंस्था आयपीएलमध्ये आज लखनौ सुपर जायंटस आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने आले होते. राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंटसला पराभूत केले. लखनौने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्या निर्णयाचा त्यांना फायदा घेता आला नाही. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये ६ बाद १५९ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौच्या […] The post लखनौविरुद्ध राजस्थान विजयी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती जिल्ह्यात रेशन दुकानदार आणि निरीक्षण अधिकाऱ्यांच्या (आयओ) संगनमताने २ कोटी ४० लाख ४८ हजार ७२ रुपयांचा धान्य घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी बुधवारी दोन निलंबित निरीक्षण अधिकाऱ्यांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी सहा रेशन दुकानदारांचे परवाने रद्द केले असून, दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. लांडे यांच्या तक्रारीनुसार, जितेंद्र सुरेश पाटील (वय ३६) आणि चैताली अजय यादव (वय ३५) या दोन अधिकाऱ्यांवर हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पाटील हे अमरावती तहसीलच्या पुरवठा विभागात निरीक्षण अधिकारी (ग्रामीण) म्हणून कार्यरत होते, तर यादव यांनी त्यांच्या बदलीपश्चात हे पद सांभाळले. जितेंद्र पाटील यांनी जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत काही दुकानदारांशी संगनमत करून ३,८७३.९० क्विंटल अतिरिक्त धान्य दिले. यामुळे शासनाचे १ कोटी ४९ लाख ८८ हजार २८४ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर, ऑक्टोबर २०२४ ते डिसेंबर २०२५ या काळात चैताली यादव यांनीही २८६७.६८ क्विंटल धान्याचा अपहार केला. यामुळे शासनाला ९० लाख ५९ हजार ७८८ रुपयांचा फटका बसला. हा घोटाळा २७ मार्च २०२६ रोजी सादर झालेल्या तपासणी अहवालातून समोर आला. या अहवालानुसार, शेवती जहांगीर येथील भारत राजुरकर, उतखेडच्या कमल चतुर्भुज लोनदासे, बोडणा येथील ए. पी. ठाकरे, शिराळा येथील अनुप हरिनारायण राठी व आशिष राधाकिसन शर्मा आणि देवरी येथील आर. आर. राऊत या सहा दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. दोन्ही निलंबित अधिकाऱ्यांवर सार्वजनिक वितरण व्यवस्था, राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील विविध तरतुदींनुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरू असतानाच, शासनाच्या निर्देशानुसार आता पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या घोटाळ्यातील अपहाराचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. २०१९ ते २०२२ या कालावधीतील ई-पॉस मशीनचा डेटा अद्याप उपलब्ध नसल्याने, घोटाळ्याची नेमकी रक्कम आणि वस्तूमान यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. मार्च २०२६ मध्ये प्राप्त झालेला चौकशी अहवाल हा अंतरिम स्वरूपाचा असून, डेटा प्राप्त होताच चौकशी पूर्ण होऊन अपहाराची रक्कम वाढण्याची दाट शक्यता आहे.
निलंगा येथील बा रुग्ण विभाग वैद्यकीय अधिका-यांविना
निलंगा : प्रतिनिधी गोरगरिबांचे मंदिर मानल्या जाणा-या निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सेवांबाबत अनियमितता समोर आली आहे. रुग्णालयात कार्यरत असलेल्या कायमस्वरूपी वैद्यकीय अधिका-यांकडून बा रुग्ण विभाग (ओपीडी) मध्ये रुग्ण तपासणी होत नसून, ती जबाबदारी आयुर्वेदिक पदवीचे शिकाऊ विद्यार्थी पार पाडत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रुग्णालयात दररोज शंभर ते दीडशे रुग्ण उपचारासाठी येत असताना, […] The post निलंगा येथील बा रुग्ण विभाग वैद्यकीय अधिका-यांविना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तिसऱ्यांदा मुलाखती घेऊनही नियुक्ती आदेश रखडले:आशा स्वयंसेविका पदासाठी निवड झालेल्या महिलांचे उपोषण
अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविका पदासाठी तिसऱ्यांदा मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, अद्याप नियुक्ती आदेश न मिळाल्याने निवड झालेल्या तीन महिला उमेदवारांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. या आंदोलनाचा आज (बुधवार) दुसरा दिवस होता, परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. उपोषणात गर्भवती महिला नीता राहुल उके, रेश्मा मनीष हरणे आणि मिनल सम्यक रंगारी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नीता उके आणि रेश्मा हरणे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे पतीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अमरावतीजवळील वलगाव येथे आशा स्वयंसेविकेच्या तीन जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवून प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र, निवडीवर शिक्कामोर्तब होण्यापूर्वीच तेथील सरपंचांनी प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने आरोग्य विभागाने ती रद्द केली. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश असलेली समिती तयार करून दुसऱ्यांदा मुलाखती घेण्यात आल्या. परंतु, यावेळीही यादी जाहीर करण्यापूर्वीच ती 'लीक' झाल्याने संबंधित समितीवर ठपका ठेवून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ही प्रक्रियाही रद्द केली. पुढे एक नवीन समिती तयार करून पुन्हा मुलाखती आयोजित करण्यात आल्या. यावेळी तीन जागांसाठी तब्बल ४४ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मागील अनुभवावरून या प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंगही करण्यात आले. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून रेश्मा मनीष हरणे, नीता राहुल उके आणि मिनल सम्यक रंगारी या तिघींची निवड झाल्याची अधिकृत यादीही घोषित करण्यात आली. दरम्यान, दुसऱ्यांदा झालेल्या मुलाखतीची यादी 'लीक' झाल्याने त्यात ज्यांची निवड झाली होती, त्यांनी आक्षेप घेऊन नव्याने प्रक्रिया राबवण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे प्रशासनाने संबंधित उमेदवारांचे नियुक्ती आदेश थांबवले आहेत. याच मुद्द्यावरून निवड झालेल्या तिन्ही महिलांनी उपोषण सुरू केले आहे.
जळकोट पंचायत समितीची आमसभा ६ वर्षांपासून नाही
जळकोट : प्रतिनिधी पंचायत समिती ही सरकार आणि ग्रामपंचायत या मधला दुवा असते. पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक विकासाच्या योजना गाव पातळीवर पोहोचत असतात, या विकास योजना पोहोचत असताना, काही नागरिकांना याबाबत अडचणीही येतात. या अडचणी सोडविण्यासाठी पंचायत समितीमध्ये आमसभेचे आयोजन करण्यात येते मात्र गत सहा वर्षांपासून पंचायत समितीमध्ये आमसभाच झाली नाही. याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाल्याचे […] The post जळकोट पंचायत समितीची आमसभा ६ वर्षांपासून नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गव्हाण येथे प्रथमच तीव्र पाणीटंचाई
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील गव्हाण गावा येथे पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. भर उन्हाळ्यात चार दिवसांनी एकदा नळाला पाणी येत असल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. जळकोट तालुक्यातील गव्हाण हे गाव तिरू नदीकाठी वसलेले आहे. या गावाला पाणीपुरवठा करणारी विहीरही तिरू नदीकाठीच असल्यामुळे तिरु नदीतील पाण्यावरच या गावातील गावक-यांची तहान […] The post गव्हाण येथे प्रथमच तीव्र पाणीटंचाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारतीय नमो संघाने मोबाईल वापरकर्त्यांना रील पाहण्याऐवजी शासकीय योजनांची माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय नमो संघाचे प्रदेश प्रभारी डॉ. मनोज कुमार तोमर यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे मत व्यक्त केले. नागरिकांनी त्यांच्या हिताच्या योजनांची माहिती घेणे अधिक उपयुक्त ठरू शकते, असे ते म्हणाले. शासकीय योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणाऱ्या या संघाने सांगितले की, अनेक नागरिक मोबाईलवर रील आणि इतर बाबींमध्ये आपला वेळ घालवतात. हाच वेळ त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती घेण्यासाठी वापरल्यास त्यांना मोठा लाभ मिळू शकतो. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, तरुण, खेळाडू, महिला आणि दिव्यांग अशा विविध घटकांसाठी दररोज नवीन योजना तयार केल्या जात आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज असले तरी, माहितीच्या अभावामुळे नागरिक त्यांचा लाभ घेऊ शकत नाहीत. भारतीय नमो संघ नेमके हेच काम करत आहे. नागरिकांनी मोबाईलवरील वेळ योजनांची माहिती घेण्यासाठी वापरावा, त्यानुसार अर्ज दाखल करावेत आणि आपली प्रगती साधावी, असे आवाहन संघाने केले आहे. भारतीय नमो संघाचे हेच मुख्य कार्य असून, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालये स्थापन केली जात आहेत. यावेळी भारतीय नमो संघाचे महामंत्री दशरथ साठे, हेमंत कालिया, नरेश बन्सल आणि अमरावतीचे समाजसेवक चंद्रकुमार उर्फ लप्पीसेठ जाजोदिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अमरावती येथील समाजसेवक लप्पीसेठ जाजोदिया यांनी भारतीय नमो संघाच्या स्थानिक कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या या प्रस्तावाबद्दल संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. जाजोदिया परिवार अशा सकारात्मक कामांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करत असतो, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
‘दयानंद विज्ञान’ जेईई मेन्स परीक्षेत यश
लातूर : प्रतिनिधी राष्ट्रीय पातळीवरील आयआयटी व नीट अशा प्रतिष्ठित अभियांत्रिकी कॉलेज मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी झालेल्या जेईई मेन्स या दुस-या फेजच्या परीक्षेचा निकाल दि. २० एप्रिल रोजी जाहीर झाला आहे. जेईई मेन्स ही परीक्षा वर्षातून दोन वेळेस घेतली जाते. दोन्ही परीक्षेपैकी ज्या परीक्षेत अधिक गुण मिळतील ते गुण प्रवेशासाठी ग्रा धरले जातात. या परीक्षेत दयानंद […] The post ‘दयानंद विज्ञान’ जेईई मेन्स परीक्षेत यश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या अयानला पोलिसांनी बुधवारी परतवाडा येथे पायी फिरवले. थार वाहनात अयानजवळ दिसलेला मोबाईल जप्त करण्यासाठी पोलिसांनी 'सिन रिक्रिएट' केले. अयानने तो मोबाईल एका मित्राला दिल्याचे सांगितले होते. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी व्हिडीओमध्ये दिसलेले थार वाहन आणि पिस्टलसदृश शस्त्रही जप्त केले आहे. अयानने ज्या मित्राला मोबाईल दिला होता, त्याचे घर समरसपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, ठाण्यापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर आहे. एसआयटीच्या हाती दोन दिवसांपूर्वी एक नवा व्हिडीओ लागला होता. या व्हिडीओनुसार, अयान महिंद्रा थार वाहनात बसलेला दिसत असून त्याच्या शेजारी महागडा मोबाईल, पिस्टलसदृश वस्तू आणि नोटांचे बंडल ठेवलेले होते. ही सर्व सामग्री आता एसआयटीने जप्त केली आहे. वाहनातील पिस्टलसदृश शस्त्र आणि महिंद्रा थार वाहन हे राजेश रोशन प्रजापती (वय ५०, रा. सावळी दातुरा, ता. अचलपूर) यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ते त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. गेल्या ११ एप्रिल रोजी परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही मुलींचे अयानसोबतचे १८ अश्लील व्हिडिओ आणि ३९ छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलीस अंमलदार निलेश काळे यांच्या तक्रारीवरून १३ एप्रिल रोजी अयान आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर सुरुवातीला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणात दोन वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या कोठडीत एक आठवड्याची वाढ करण्यात आली. अयान अहमद आणि त्याचे तीन साथीदार उजेर खान इकबाल खान, मो. साद इकबाल खान आणि तरबेज खान मो. साबीर अशा चौघांचीही पोलीस कोठडी (पीसीआर) २७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. सहायक सरकारी वकील डी. ए. नवले आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी न्यायालयात प्रभावीपणे आपली बाजू मांडून सर्व चारही आरोपींची पुन्हा आठवडाभराची पोलीस कोठडी मिळवली. यावेळी अचलपूर न्यायालयाला एकप्रकारे पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा खासदार डॉ. कल्याणराव काळे यांच्याकडून सत्कार
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या आशियाना निवासस्थानी जालना येथील काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याणराव काळे यांनी भेट दिली. माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. कल्याणराव काळे व माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्यात काँग्रेस पक्षाचे […] The post माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा खासदार डॉ. कल्याणराव काळे यांच्याकडून सत्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रेणापूर बाजार समितीतर्फे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त दि. २२ एप्रिल रोजी रेणापुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आशियाना निवासस्थानी संचालक मंडळाने भेट घेवून यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी सभापती उमाकांत खलंग्रे उपसभापती अँड. शेषराव हाके, संचालक प्रकाश सुर्यवंशी संचालक तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद कापसे, संचालक प्रवीण […] The post रेणापूर बाजार समितीतर्फे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे : जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड
लातूर : प्रतिनिधी मॉन्सून काळात उद्भवणा-या प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा आणि तालुकास्तरावरील सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच सर्व विभागांनी आपली आपत्कालीन प्रतिसाद कार्यपद्धती अद्ययावत करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज येथे दिल्या. मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे […] The post आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे : जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ते विधेयक महिला आरक्षणाचे नव्हे तर डिलिमिटेशनचे होते
लातूर : प्रतिनिधी संसदेत महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच सर्व पक्षांच्या पाठिंब्याने मंजूर झालेले आहे. १६ एप्रिलला जे विधेयक लोकसभेत मांडले होते ते डिलिमिटेशनचे होते, या विधेयकाआडून भाजपाला देशाचे तुकडे करायचे होते. भाजपाचे नेते डिलिमिटेशनवर काहीच बोलत नाहीत. भाजपाचा हा दुष्ट हेतू काँगे्रस पक्षाने ओळखला व त्या विधेयकाला विरोध केलेला आहे. महिलांना सर्वात प्रथम काँग्रेस […] The post ते विधेयक महिला आरक्षणाचे नव्हे तर डिलिमिटेशनचे होते appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
क्षय रुग्णांना पोषण आहाराचे वाटप
लातूर :लातूर जिल्हा कुष्ठरोग निवारण केंद्राच्या वतीने क्षयरुग्णांना फुड बास्केटचे वाटप करण्यात आले. लातूर येथील जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्रात झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. वैशाली मोहिते पाटील, लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत, सचिव डॉ. विश्रांत भारती, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्रोफेसर प्रा. डॉ. अभिजीत यादव, जिल्हा आरोग्य प्रशिक्षण […] The post क्षय रुग्णांना पोषण आहाराचे वाटप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शाहू महाविद्यालयाचे जेईई-अॅडव्हान्स परीक्षेसाठी २०५ विद्यार्थी पात्र
लातूर : प्रतिनिधी नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) द्वारे घेण्यात आलेल्या जेईई-मेन-२०२६ परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत राजर्षी शाहू ज्युनिअर सायन्स कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील एकूण ४१२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी २०५ विद्यार्थी जेईई-ॅअॅडव्हान्स परीक्षेसाठी ठरले आहेत. महाविद्यालयातील श्रवण दीपक बुलबुले हा विद्यार्थी (९९.८२२१९९) पर्सेंटाईल घेऊन महाविद्यालयातून सर्वप्रथम आला […] The post शाहू महाविद्यालयाचे जेईई-अॅडव्हान्स परीक्षेसाठी २०५ विद्यार्थी पात्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नूतन जिल्हाधिका-यांची जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांनी घेतली सदिच्छा भेट
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी आपल्या सहका-यांसह लातूरचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विकासाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या चर्चेत जिल्ह्यातील बराजेसचे जुने झालेले गेट दुरुस्ती करणे, शेतक-यांना पिकविमा तत्परतेने मिळणे, पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था अधिक सक्षम […] The post नूतन जिल्हाधिका-यांची जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांनी घेतली सदिच्छा भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीमुळे राजकीय गणितांना वेग आला आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर होणाऱ्या या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व दिसत असले, तरी उमेदवारी कोणाला द्यायची यावरून पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली, तर त्यानंतर आता 'वर्षा' निवासस्थानी पुन्हा एकदा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार 23 एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर होईल, 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 2 मे रोजी छाननी होणार असून 4 मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 12 मे रोजी मतदान व मतमोजणी होणार असून 13 मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. विधान परिषदेच्या एका जागेसाठी साधारण २८ ते २९ मतांची आवश्यकता आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीचे आठ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. यामध्ये भाजपला ५ जागा, शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला १ जागा येणार आहे. भाजपचे पाच उमेदवार निश्चित निवडून येणार असल्याने पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी आहे. मात्र, भाजपमधील जुने नेते इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यास विरोध करत असल्याचे समजते. या संपूर्ण घडामोडींबाबत आज रात्री उशिरा किंवा गुरुवारी सकाळपर्यंत मोठे अपडेट समोर येण्याची शक्यता आहे. विधानसभेतील महायुतीचे संख्याबळ मविआमध्ये एका जागेसाठी संघर्ष दुसरीकडे, महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक मोठी कसोटी ठरणार आहे. मविआतील कोणत्याही पक्षाकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्याइतपत मते नाहीत. त्यामुळे एकमेकांच्या मदतीशिवाय मविआचा उमेदवार जिंकणे अशक्य आहे. सद्यस्थितीत, उपलब्ध एका जागेसाठी श आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार? याचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे. विधानसभेतील महाविकास आघाडीचे संख्याबळ राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ठरणार कळीची? अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे काही अतिरिक्त मते आहेत. जर महायुतीने पाचव्या जागेव्यतिरिक्त अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवला, तर ही निवडणूक चुरशीची होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणावर 'फोडाफोडी'चे राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेदवारी अर्जासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असल्याने, महायुती आणि मविआकडून उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची दाट शक्यता आहे.
राज्यात उन्हाचा चटका असह्य होत असतानाच आता वरुणराजाने हजेरी लावत नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. मात्र, हा दिलासा वादळी वारे आणि गारपिटीचे संकट घेऊन येण्याची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढील ४ दिवस पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असल्याची माहिती पुण्यातील हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग अधिक राहणार असून सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, सातारा, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, परभणी, बीड आणि विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. एकीकडे पाऊस, दुसरीकडे उन्हाचा चटका राज्यात हवामानाची दोन टोकाची रूपे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पावसाचा अंदाज असतानाच, दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढेच राहणार आहे. त्यामुळे विदर्भवासीयांना पाऊस आणि कडक ऊन अशा दोन्ही संकटांचा सामना करावा लागणार आहे. सातारा आणि पुण्यात गारांचा पाऊस आज साताऱ्यात आणि पुण्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सातारा शहर आणि ग्रामीण भागात दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. मात्र, महिनाभराच्या प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकर आणि साताराकरांनी या पावसात भिजण्याचा आनंद लुटला. विशेषतः लहान मुलांनी गारा वेचण्यासाठी रस्त्यावर गर्दी केली होती. शेतकऱ्यांच्या चिंतेत भर ऐन उन्हाळ्यात होत असलेल्या या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीच्या इशाऱ्यामुळे शेतकरी मात्र धास्तावला आहे. काढणीला आलेल्या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विजा कडकडत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नका, गारपीट होत असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या, शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी काढणी झालेला माल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जरांगेंना मारण्याचा कराड गँगचा प्लॅन?
बीड : जिल्हा कारागृहात पुन्हा एकदा कराड गँगची दहशत चर्चेमध्ये आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी प्रतीक घुले, सुदर्शन घुले यांनी एका कैद्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. जेलमध्ये घडलेला प्रकार कैद्याकडून दादासाहेब खिंडकर यांना सांगतानाची एक कथित ऑडिओ क्लीपदेखील व्हायरल झाली आहे. या संदर्भात जेल प्रशासनाकडून मारहाण झालेल्या कैद्याला विचारणा करण्यात आली, […] The post जरांगेंना मारण्याचा कराड गँगचा प्लॅन? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक वारसा दिनानिमित्त आयोजित 'हेरिटेज वॉक'मधून सातारा परिसरातील ऐतिहासिक खंडोबा मंदिरात एक अनोखा 'किरणोत्सव' उघडकीस आला आहे. दोन ते अडीच शतकांपूर्वीच्या भारतीय शिल्पकारांच्या खगोलशास्त्रीय कौशल्याचा हा एक अद्भुत पुरावा आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः हा विलोभनीय सोहळा कॅमेऱ्यात कैद केला. 'इंटॅक' आणि 'सहपीडिया' यांच्या वतीने आयोजित या हेरिटेज वॉकमध्ये पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर सहभागी झाले होते. मंदिराला भेट दिल्यानंतर पुजाऱ्यांनी येथील किरणोत्सवाचा उल्लेख केला. या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी औंधकर आणि पवार यांनी अधिक चौकशी केली असता, हा किरणोत्सव बुधवारपासून सुरू होत असल्याचे समोर आले. ठरल्याप्रमाणे, आज सकाळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर मंदिरात उपस्थित होते. सूर्य वर येताच, त्याची किरणे गर्भगृहाच्या झरोक्यातून मंदिरात प्रवेशली. हा प्रकाशझोत खंडेरायाच्या देव्हाऱ्याच्या कळसाकडून हळूहळू खाली सरकत चरणांपर्यंत पोहोचला, ज्यामुळे संपूर्ण गर्भगृह सोनेरी प्रकाशाने उजळून निघाले. सुमारे दोन ते अडीच शतकांपूर्वी कोणत्याही आधुनिक उपकरणांशिवाय भारतीय शिल्पकारांनी खगोलशास्त्राचा अचूक अभ्यास करून हे मंदिर उभारले होते. सूर्याच्या उत्तरायण-दक्षिणायन स्थितीचा विचार करून झरोक्यांची केलेली रचना आजही तितकीच अचूक ठरत आहे. श्री. पवार आणि श्री. औंधकर यांच्या प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. हा 'किरणोत्सव' उद्या आणि परवा, म्हणजेच २३ व २४ एप्रिल रोजी सकाळी ८:३० ते ९ या वेळेत भाविकांना पाहता येणार आहे. नागरिकांनी या अद्भुत खगोलीय अविष्काराचे साक्षीदार होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात मोठी कारवाई केली आहे. मध्यवर्ती भागात केलेल्या या धडक मोहिमेत ५१७० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, संबंधित विक्रेत्यांकडून ₹७५,००० दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई झोन क्र. २ अंतर्गत अंगुरी बाग आणि जुना मोंढा परिसरातील ३ ते ४ दुकानांची तपासणी करून करण्यात आली. यामध्ये शालिमार प्लास्टिक, संजय प्लास्टिक, एनबी प्लास्टिकसह इतर स्थानिक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान, या विक्रेत्यांच्या शहरातील विविध दुकाने, गोदामे आणि ट्रान्सपोर्ट कंपन्यांवरही छापे टाकून प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जप्त केलेले प्लास्टिक हर्सूल कचरा प्रक्रिया केंद्रावर श्रेडिंग करून तात्काळ विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेकडून प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात सातत्याने जनजागृती केली जात असून, नागरी मित्र पथकाद्वारे नियमित कारवाई सुरू आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकची वाहतूक आणि विक्री होत असल्याने ही विशेष मोहीम राबवण्यात आली. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त रमेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरी मित्र पथकाने ही कारवाई केली. या पथकात देविदास सुसर, बालाजी साबळे, सुवर्णसिंग परदेशी, जनार्दन सांगळे, संतोष बनकर, किशन निकम, ज्ञानेश्वर पाटील, रतन वाघ, नारायण फुके, जयेश मगरे यांचा समावेश होता. यावेळी स्वच्छता अधिकारी अनिल जाधव, स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ, अभिजित गंगावणे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. महापौर समीर राजूरकर यांनी सांगितले की, शहरात प्लास्टिकचा सर्रास वापर खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून महानगरपालिकेला सहकार्य करावे आणि पर्यायी साधनांचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले. आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले की, यापुढेही शहरात प्रतिबंधित प्लास्टिकची विक्री किंवा वापर आढळल्यास कठोर कारवाई करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. दरम्यान, नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत प्लास्टिक बंदीवर सविस्तर चर्चा झाली होती. महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, सभागृह नेते गोविंद केंद्रे, विरोधी पक्षनेते समीर सय्यद यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांनी शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी एकमताने भूमिका घेत प्रशासनाला कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
मुंबई : प्रतिनिधी २००६ मधील बहुचर्चित आणि संवेदनशील असलेल्या मालेगाव साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पुराव्यांच्या अभावामुळे या चौघांविरुद्धचे दोषारोप न्यायालयाने रद्द केले असून, त्यांना या प्रकरणातून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे संबंधित आरोपींवरील खटल्याची प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे. ८ सप्टेंबर २००६ रोजी मालेगावमध्ये शब-ए-बारातच्या […] The post मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील ४ आरोपींची निर्दोष मुक्तता! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील साडेचार लाख हेक्टरहून अधिक असलेल्या देवस्थान इनाम जमिनींच्या हस्तांतरणाबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील तीन दिवसांत कायद्याचा मसुदा सार्वजनिक केला जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. एक महिन्याचा वेळ हरकती व सूचना नोंदवण्यासाठी जनतेला दिला जाईल. त्यांच्या सूचनांचा विचार करून जुलैमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात या कायद्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. देवस्थान, कुळ आणि वहिवाटदारांचे हक्क निश्चित करण्यासाठी राज्य सरकार एक सर्वसमावेशक कायदा असेल, असे ते म्हणाले. राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर देवस्थान इनाम जमिनी आहेत. या जमिनींवर काही ठिकाणी कुळांची नावे तर काही ठिकाणी वहिवाटदार पिढ्यानपिढ्या शेती करत आहेत. मात्र, देवस्थान जमिनी असल्याने त्यांच्या हस्तांतरणावर बंदी असल्याने अनेक विकासकामे रखडली असून शेतकऱ्यांनाही आपल्या जमिनीबाबत कोणतेही ठोस निर्णय घेता येत नव्हते. ही कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार हा नवीन कायदा तयार करण्यात येत आहे, असेही त्यांनी माध्यमाना सांगितले. 18 प्रस्तावांना CM फडणवीसांची मंजुरी दरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹2,56,137.01 कोटींच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची 14 वी बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी.अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू तसेच विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते. सविस्तर वाचा…
हिंगोली जिल्ह्यांमध्ये अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस विभाग व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट सक्ती केली असून पहिल्याच दिवशी बुधवारी तारीख 22 दिवसभरात 511 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी वाहनांची अपघात होत असून हेल्मेट नसल्यामुळे अनेकांना प्राण गमविण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस प्रशासन व उपप्रादेश परिवहन कार्यालयाने जनजागृती कार्यक्रम घेऊन हेल्मेट सक्तीचा निर्णय जाहीर केला. दरम्यान पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, अपर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शरद मरे यांच्यासह पोलिस कर्मचारी शिवाजी पारस्कर, गजानन राठोड तसेच महिला कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासूनच दुचाकी वाहन चालकांची तपासणी सुरू केली होती. यामध्ये विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यासोबतच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटर वाहन निरीक्षक यांच्या पथकाने कारवाईची मोहीम हाती घेतली होती. या दोन्ही कार्यालयांच्या पथकाने हाती घेतलेल्या मोहिमेत पहिल्याच दिवशी 511 दुचाकी वाहन चालकांवर हेल्मेट नसल्यामुळे प्रत्येकी 1000 रुपये याप्रमाणे पाच लाख 11 हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने 403 वाहन चालकांवर कारवाई केली तर वाहतूक शाखेने 108 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी तब्बल 511 जणांना दंड लागल्यामुळे हिंगोली शहरात दुचाकी चालकांमधून हेल्मेटची मागणी वाढली आहे. दंड टाळण्यासाठी अनेकांनी हेल्मेट खरेदी करणे पसंत केले दिवसभरात हेल्मेट विक्रीच्या दुकानातून किमान 200 पेक्षा अधिक हेल्मेट विक्री झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यापुढे ही मोहीम आणखी गतिमान केली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले. वाहनांसोबत कागदपत्रे बाळगावीत : शरद मरे पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा हिंगोली शहरात वाहतूक शाखेच्या वतीने वाहन तपासणी मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहेच याशिवाय वाहन चालवताना वाहन चालविण्याचा परवाना तसेच वाहनाची कागदपत्रे सोबत बाळगावीत.
नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात हिला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. राहता सत्र न्यायालयाने कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आज पार पडलेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंनी सुमारे सव्वा तास जोरदार युक्तिवाद झाला, मात्र सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला. कल्पना खरातवर पती अशोक खरात याच्या कथित बेकायदेशीर कृत्यांमध्ये सक्रिय साथ दिल्याचा आरोप आहे. तपासात असे समोर आले आहे की, अनेक बँक व्यवहार आणि जमिनीच्या खरेदी-विक्रीत तिचा थेट सहभाग होता. शिर्डीतील एका शेतकऱ्याची जमीन खरेदी प्रकरणात मोठी फसवणूक केल्याचा गंभीर आरोप तिच्यावर आहे. या व्यवहारांतील पैसे कल्पनाच्या भावांच्या खात्यातून वळवण्यात आल्याचेही एसआयटी (SIT) तपासात उघड झाले आहे. न्यायालयात काय झाला युक्तिवाद? कल्पना खरात ३१ मार्चपासून फरार असून, तिने वकिलामार्फत न्यायालयात आपली बाजू मांडली होती. आज तिच्या अटपूर्व जामिनावर राहता न्यायालयात सुनावाणी पार पडली. या सुनावणीदरम्यान कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांनी तिचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. प्रशांत गिरी यांनी असा युक्तिवाद केला की, कल्पना ही केवळ गृहिणी असून अशोक खरातच्या कथित गैरकृत्यांशी तिचा कोणताही थेट संबंध नाही. तिची सर्व बँक खाती अशोक खरातच हाताळत होते आणि व्यवहारांच्या कोणत्याही बैठकीत ती उपस्थित नव्हती, असा दावा करण्यात आला. मात्र, सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी हे सर्व मुद्दे खोडून काढले. आरोपी महिला जाणीवपूर्वक तपास यंत्रणेला सहकार्य करत नसल्याचा आणि ती देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असल्याचा मुद्दा पोलिसांनी लावून धरला. पुढील कारवाई काय? कल्पना खरात देशाबाहेर पळून जाऊ नये, यासाठी पोलिसांनी यापूर्वीच तिच्याविरोधात 'लूकआऊट नोटीस' जारी केली आहे. तिचा जामीन अर्ज फेटाळल्या गेल्यामुळे आता पोलिस तिला कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी या प्रकरणात तिचा मुलगा हर्षवर्धन आणि तिच्या दोन भावांचीही कसून चौकशी केली आहे. अशोक खरातसोबत १९९३ मध्ये विवाह पोलिस तपासातून कल्पना खरातच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक बाबी समोर आल्या आहेत. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील सुनीता शिंदे ही १९९३ मध्ये अशोक खरातशी विवाहबद्ध झाल्यानंतर 'कल्पना खरात' झाली. तिचे प्राथमिक शिक्षण पाडळीत, तर माध्यमिक शिक्षण ठाणगावमधील डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात झाले. दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार असलेल्या कल्पनाची सुरुवातीला केवळ पत्नी म्हणून असलेली तिची ओळख नंतर अशोक खरातच्या फसवणुकीच्या आणि बेनामी मालमत्तेच्या व्यवहारांमधील मुख्य भागीदारीत बदलली गेल्याचे निष्पन्न झाले आहे.
पुणे शहर महिला काँग्रेसने बुधवारी महिला आरक्षण विधेयक त्वरित लागू करण्याची मागणी करत भारतीय जनता पक्षाविरोधात आंदोलन केले. पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजपने खोटा प्रचार थांबवून २०२३ मध्ये संसदेने मंजूर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बालगंधर्व रंगमंदिराजवळील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात हे आंदोलन झाले. आंदोलकांनी 'भाजप हटाओ, महिला आरक्षण बचाओ', 'आरक्षणावर घाला घालणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो', 'महिला आरक्षण लागू करा, नाहीतर खुर्च्या खाली करा', 'आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचे' अशा घोषणांचे फलक हातात घेतले होते. यावेळी बोलताना स्वाती शिंदे यांनी मोदी सरकारवर टीका केली. महिला आरक्षणाचे श्रेय घेण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न केविलवाणा असल्याचे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने यापूर्वीच घेतला असून, महापालिका, जिल्हा परिषदा आणि सहकारी संस्थांमध्ये त्याची अंमलबजावणीही झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करत फिरू नये, अशा शब्दांत स्वाती शिंदे यांनी भाजप नेत्यांना खडसावले. महिलांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष नेहमीच कटिबद्ध राहिला असल्याचेही त्यांनी नमूद केले. या आंदोलनात नगरसेसेविका अश्विनी लांडगे, अनिता मकवाना, प्राजक्ता जाधव, प्रियांका रणपिसे, अंजली सोलापुरे, नयना सोनार, रेखा जैन, ॲड. अंजली देसाई, कनहर आदरखान, ॲड. राजश्री दामले-चव्हाण, मनोरमा चौधरी, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, मनिषा धेंडे, ऋग्वेदी सपकाळ, सुमन हरिश्चंद्र सूर्यवंशी, पूजा सपकाळ, सुरेखा मारणे, पौर्णिमा नाईकमोडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
पुणे शहरात दोन दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू:विश्रांतवाडी, लोणी काळभोर परिसरात घडल्या घटना
पुणे शहरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. विश्रांतवाडी आणि पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात या घटना घडल्या. विश्रांतवाडी येथे भरधाव दुचाकी घसरल्याने अजयकुमार डोमन मंडल (वय ३०, रा. येरवडा, मूळ बिहार) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी सुजीत सहानी (वय ३०, रा. विश्रांतवाडी) जखमी झाला. सहानी यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजयकुमार आणि सुजीत विश्रांतवाडी परिसरातून जात असताना, फुलेनगरजवळ अजयकुमारचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यावर घसरली गेली. दुचाकी घसरल्याने अजयकुमारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अजय याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक शेख या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरी घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर भागात घडली. मंगळवारी (२१ एप्रिल) दुपारी दोनच्या सुमारास डंपरच्या धडकेत गैारीशंकर शिवराज सपळे (वय ३५, रा. गुनवडी, बारामती, मूळ बेळम, ता. उमरगा, जि. धाराशिव) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गौरीशंकर यांचा भाऊ शिवशंकर (वय ३८, रा. बेळम) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरीशंकर पुणे-सोलापूर रस्त्यावरून जात असताना, कदमवाक वस्ती परिसरात एका टँकरने त्यांना जोरात धडक दिली. अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या गौरीशंकर यांचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव पुढील तपास करत आहेत.
राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹2,56,137.01 कोटींच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची 14 वी बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी.अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू तसेच विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते. 18 प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांची मान्यता या बैठकीमध्ये थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सोलर सेल, मॉड्युल, इग्नॉट, वेफर्स, ग्रीन स्टील, हरित अमोनिया, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, अवकाश व संरक्षण साहित्य, लिथियम आयन बैटरी, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती/साहित्य, स्टील व गॅस टू केमिकल निर्मितीचे विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्यासाठीच्या 18 प्रस्तावांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली. प्रमुख गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तसेच तांत्रिक नवकल्पना, संशोधन-विकास आणि मजबूत पुरवठा साखळी निर्माण होण्यास मदत होईल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही याचा लाभ होणार आहे. याशिवाय, स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण व कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होणार आहे.
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात
कोलकाता : अमेरिकेने इराणच्या विरोधात सुरू केलेली नाकेबंदी आता केवळ आखाती देशांपुरती मर्यादित राहिलेली नाही. २१ एप्रिल २०२६ रोजी अमेरिकन सैन्याने बंगालच्या खाडीत, म्हणजेच श्रीलंका आणि इंडोनेशिया यांच्या दरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात टिफनी नावाचे तेलवाहू जहाज जप्त केले. जप्त केलेले जहाज बोत्सवानाचा झेंडा लावून फिरत होते, मात्र ते इराणचे डार्क फ्लीट असून प्रतिबंध झुगारून तेलाची […] The post अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमेरिका-इराणच्या वादामुळे जपानला दणका
टोकियो : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव आणि अमेरिकेची संरक्षणवादी व्यापारी धोरणे याचा फटका आता जपानच्या अर्थव्यवस्थेला बसू लागला आहे. मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे जपानला तब्बल १७०० अब्ज येन म्हणजेच सुमारे १ लाख कोटी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. सलग पाचव्या वर्षी जपानला व्यापार तुटीचा सामना करावा लागत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. […] The post अमेरिका-इराणच्या वादामुळे जपानला दणका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारत-न्यूझीलंड करार म्हणजे ‘बटर चिकन त्सुनामी’!
ऑकलंड : न्यूझीलंडमधील एका वरिष्ठ मंत्र्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नियोजित असलेल्या मुक्त व्यापार कराराबाबत केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे. न्यूझीलंडमधील या मंर्त्याने दोन्ही देशांमधील हा कराराला ‘बटर चिकन त्सुनामी’ असे म्हटल्याने संताप व्यक्त केला जात आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार करारावर पुढच्या आठवड्यात दिल्लीत स्वाक्षरी केली जाणे अपेक्षित आहे. न्यूझीलंड […] The post भारत-न्यूझीलंड करार म्हणजे ‘बटर चिकन त्सुनामी’! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लोकसभेत महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपने मुंबईत काढलेल्या जनआक्रोश मोर्चाला वादाची फोडणी मिळाली आहे. वरळी परिसरात मंगळवारी काढण्यात आलेल्या या मोर्चात पोलिसांनी घातलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत वरळी पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मोर्चात झालेली वाहतूक कोंडी आणि एका महिलेने थेट मंत्र्यांना विचारलेला जाब, यामुळे हा मोर्चा राज्यभर गाजत आहे. भाजपने या मोर्चासाठी रीतसर परवानगी घेतली होती. मात्र, वरळी पोलिसांनी परवानगी देताना काही कडक अटी आणि शर्ती घालून देण्यात आल्या होत्या. मंगळवारी झालेल्या या मोर्चात या अटींचे पालन झाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी आणि त्यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था यामुळे सर्वसामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या आधारावर पोलिसांनी नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे आता आयोजकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. मंत्री गिरीश महाजन यांना विचारला जाब या मोर्चादरम्यान वरळीत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. भररस्त्यात अडकलेल्या एका संतप्त महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या ताफ्यासमोर जाऊन तुमच्या आंदोलनामुळे सामान्य लोकांचे हाल का? असा रोकडा सवाल विचारला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, सर्वसामान्यांच्या रोषाची ही झलक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. आता अटीशर्तींचे उल्लंघन केल्यामुळे मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता आयोजकांवर कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रथम नागरिक म्हणून रितू तावडेंची दिलगिरी वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांची गैरसोय झाल्याबद्दल मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. वरळी येथे आयोजित महिलांचा जनआक्रोश मोर्चा हा पूर्णपणे पूर्वनियोजित असून सर्व आवश्यक परवानग्या घेऊनच काढण्यात आला होता. नागरिक आणि वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस आणि वाहतूक विभागाकडून योग्य नियोजनही करण्यात आले होते. तरीही काही लोकांना त्रास झाला असेल तर मी मुंबईची प्रथम सेविका म्हणून दिलगिरी व्यक्त करते, असे महापौर म्हणाल्या. गिरीश महाजांना जाब विचारणाऱ्या महिलेबद्दल प्रतिक्रिया महापौर रितू तावडे यांनी दिलगिरी व्यक्त करतानाच मोर्चाचे समर्थनही केले. नारीशक्ती वंदन अधिनियमाला विरोध करून महिलांचे राजकीय हक्क हिरावणाऱ्यांविरुद्ध हा आमचा ठाम लढा आहे. तप्त उन्हात राज्यभरातून हजारो महिला या मोर्चात सहभागी झाल्या, कारण हा केवळ आंदोलन नव्हता- हा महिलांच्या हक्कांचा आक्रोश होता. त्यामुळे मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक भगिनीचा, आमचा रोष 'ती' भगिनी आणि सर्व नागरिक समजून घेतील,' असा विश्वास रितू तावडे यांनी व्यक्त केला. हे ही वाचा… गिरीश महाजनांची व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया:म्हणाले - सदर महिला नको त्या भाषेत बोलत होती, तिने पोलिसांशीही अरेरावी केली मुंबईच्या वरळी येथे महायुतीच्या आक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. यावरून विरोधकांनी सरकारवर विशेषतः भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता काल घडलेल्या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्या महिलेची भाषा योग्य नव्हती, त्या वाट्टेल ते बोलत असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा…
तेहरान : अमेरिका आणि इराणमधील युद्धात पाकिस्तानने मध्यस्ती केली. ८ एप्रिल रोजी झालेला युद्धविरामही पाकिस्तानशी चर्चा करून घेतला असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. तर, आजही पाकिस्तानशी चर्चा करून शस्त्रसंधी कायम ठेवली असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले. एकीकडे अमेरिकेकडून पाकिस्तानचे आभार मानले जात असताना इराणने मात्र पाकिस्तानवर दुहेरी खेळ खेळत असल्याचा आरोप केला आहे. विशेष […] The post पाककडून डबल गेम सुरू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रामध्ये '१०८' रुग्णवाहिका सेवेने आपत्कालीन वैद्यकीय सेवेत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. या सेवेमुळे आतापर्यंत ५ लाख ४६ हजार १० अपघातग्रस्तांचे प्राण वाचले आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत घटनास्थळी पोहोचून रुग्णांना तातडीचे उपचार देणे आणि त्यांना सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करण्यात या सेवेने मोठे यश मिळवले आहे. ही सेवा 'भारत विकास ग्रुप' (बीव्हीजी) द्वारे महाराष्ट्रात संचालित केली जाते. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने ही यंत्रणा २४ तास वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी कार्यरत आहे. बीव्हीजीने सुविधा व्यवस्थापन क्षेत्रात देशात आपले स्थान निर्माण केले असून, ही सेवा महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीरमध्येही यशस्वीपणे राबवली जात आहे. '१०८' रुग्णवाहिका सेवेचा सर्वाधिक फायदा दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यांना झाला आहे. नंदुरबार, गडचिरोली, धुळे, पालघर, नाशिक, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये एकूण १ लाख २१ हजार ६८५ अपघातग्रस्तांना या सेवेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत. दुर्गम भागात, जिथे पोहोचणे आव्हानात्मक असते, तिथे ही सेवा खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, तेथे २१ आपत्कालीन पथके २४ तास तैनात करण्यात आली आहेत. या पथकांनी आतापर्यंत ५८९ अपघातग्रस्तांना तातडीची मदत देऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत. बीव्हीजीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले की, आरोग्य विभागाने सोपवलेली जबाबदारी आम्ही निष्ठेने पार पाडत आहोत. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान कर्मचाऱ्यांनी भारतीय सैन्यदलासोबत समन्वय साधून केलेले कार्य उल्लेखनीय आहे. या शौर्याबद्दल लवकरच या 'वीर योद्ध्यांचा' विशेष गौरव करण्यात येणार आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी बुधवारी काँग्रेससह 'इंडी' आघाडीवर गंभीर आरोप केले. 'नारी शक्ती वंदन अधिनियम' आणि परिसीमन विधेयकाला विरोध करून काँग्रेसने महिलांसह महाराष्ट्रातील मतदारांच्या प्रतिनिधित्वाच्या हक्काचा विश्वासघात केला आहे, असे सूर्या म्हणाले. महिलांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार प्रणिली शिंदे यांच्या चर्चेच्या आवाहनावर सूर्या म्हणाले की, त्यांनी वेळ आणि जागा निश्चित करावी, आपण सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहोत. भाजप पुन्हा मोठ्या ताकदीने महिला विधेयक संसदेत आणणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकसभा आणि सर्व विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या 'नारी शक्ती वंदन अधिनियमा'तील दुरुस्ती आणि परिसीमन विधेयक संसदेत पारित होऊ शकले नव्हते. या पार्श्वभूमीवर पुणे शहर भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेससह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि इतर विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. या पत्रकार परिषदेला युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ, प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, प्राजक्ता जोशी, प्रणव गंजीवाले आणि पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. सूर्या यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या प्रयत्नांनंतरही काँग्रेस आणि 'इंडी' आघाडीच्या घटक पक्षांनी महिला आरक्षणाचा मार्ग रोखला. संसदीय इतिहासात १९९६ पासून आजपर्यंत एकूण पाच वेळा महिला आरक्षण विधेयक संसदेत आले. प्रत्येक वेळी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सुनियोजित कट रचून महिला आरक्षणाला विरोध केला. भाजपने मात्र विरोधात असतानाही महिला आरक्षणाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. आगामी काळात संसदेत पुन्हा 'नारी शक्ती वंदन अधिनियम' मांडले जाईल आणि त्यावेळी कोणताही पक्ष महिलाविरोधी भूमिका घेण्याची हिंमत करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेसचा इतिहास महिलाविरोधी असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, काँग्रेसने महिलांच्या प्रगतीत कायम अडथळे आणले आहेत. हिंदू महिलांना हक्क देणाऱ्या 'हिंदू कोड बिला'ला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी विरोध केला होता, ज्यामुळे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शहाबानो खटल्यातही काँग्रेसने व्होटबँकेचे राजकारण करत गरीब मुस्लिम महिलांवर अन्याय केला. तसेच, तिहेरी तलाकच्या अमानवी आणि बेकायदा प्रथेचे समर्थन केले, अशी टीका सूर्या यांनी केली. परिसीमन विधेयकामुळे महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यात लोकसभेच्या ५० टक्के जागा 'प्रो-रेटा' तत्त्वावर वाढविण्यात येणार होत्या. मात्र, काँग्रेससह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी याला विरोध केल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान होणार आहे, असे सूर्या म्हणाले. याबाबत मतदारांनी विरोधकांना जाब विचारला पाहिजे. विरोधकांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या ५४३ जागांची पुनर्रचना केल्यास महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ एक अतिरिक्त जागा येईल, असेही त्यांनी नमूद केले.
धडा शिकवायची हीच योग्य वेळ : मनसे
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपनगरातील ज्या रिक्षा आहेत, त्यांच्यासाठी ‘मी मराठी बोलतो, मला मराठी समजते आणि माझ्या रिक्षात तुम्ही बसू शकता’, या नवीन उपक्रमाला सुरुवात करत आहोत. उपनगरातील रिक्षांवर स्टिकर लावण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील मराठी प्रेमी जनतेला आमचे आवाहन आहे की, ज्या रिक्षांवर असे स्टिकर दिसेल, त्यांनीच […] The post धडा शिकवायची हीच योग्य वेळ : मनसे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळला
खोपोली : प्रतिनिधी साता-यानंतर खोपोलीतही शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला असून शिवसैनिकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी खोपोलीत योग्य फिल्डिंग लावत थोरवे यांच्या जवळचे लोक फोडले. शिवसेनेतील अंतर्गत नाराजीचा फायदा उचलत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिवसैनिकांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे आमदार थोरवेंसह एकनाथ शिंदेंना जबर धक्का बसला आहे. […] The post शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जावयाने चक्क सासरवाडीच दिली पेटवून
नंदुरबार : संसाराचा गाडा ओढण्यासाठी पती-पत्नी महत्त्वाचे मानले जातात. कधीतरी दोघांमध्ये खटके उडणे साहजिक आहे. मात्र त्यातही रुसलेल्या पतीची किंवा पत्नीची माफी मागून नाते पूर्वीसारखे सुरळीत करणे ही देखील दोघांची जबाबदारी मानली जाते. मात्र धडगाव तालुक्यात रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला सासरकडची मंडळी परत पाठवत नसल्याच्या रागातून, एका जावयाने चक्क सासरवाडीच पेटवून दिली असल्याची धक्कादायक घटना […] The post जावयाने चक्क सासरवाडीच दिली पेटवून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तब्बल १५० वर्षांनंतर जगावर ‘एल निनो’चे संकट
न्यूयॉर्क/नवी दिल्ली : यंदा संपूर्ण जग एका मोठ्या भीषण संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. १८७७-७८ मध्ये अशीच घटना घडली होती, ज्या घटनेने संपूर्ण जगात हाहाकार उडाला होता, त्याची पुनरावृत्ती २०२७ मध्ये घडू शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे संकेत मिळत आहेत. जगभरातील हवामान तज्ज्ञांकडून यंदाच्या […] The post तब्बल १५० वर्षांनंतर जगावर ‘एल निनो’चे संकट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माणूस मेल्यानंतर केल्या जाणाऱ्या कर्मकांडांना फाटा देण्यासाठी आणि समाजातील घट्ट बसलेल्या अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावच्या सरपंचांनी एक धाडसी निर्णय घेतला आहे. सरपंच शरद आरगडे यांनी चक्क जिवंतपणीच स्वतःचे 'पिंडदान' आणि 'दहाव्याचा' विधी उरकला आहे. २१ एप्रिल रोजी पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या विधीची चर्चा आता संपूर्ण राज्यभरात रंगली आहे. हिंदू धर्मात व्यक्तीच्या निधनानंतर १० व्या दिवशी पिंडदान आणि उत्तरकार्य करण्याची प्रथा आहे. मात्र, मेल्यानंतर कोणी काय केले हे पाहायला मी जिवंत असणार नाही, मग जे काही करायचे आहे ते माझ्या डोळ्यादेखत का नको? असा तर्कसंगत विचार करून सरपंच शरद आरगडे यांनी हा निर्णय घेतला. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील स्मशानभूमीत हा अनोखा विधी पार पडला. या विधीमध्ये त्यांच्या पत्नी आणि मुलानेही शास्त्रोक्त पद्धतीने सहभाग घेतला. विशेष म्हणजे, विधी सुरू असताना अनेक कावळ्यांनी पिंडाला स्पर्श केला, जे पाहून उपस्थित नागरिक अवाक झाले. सामाजिक समतेचा पुरस्कार करणाऱ्या शरद आरगडे यांनी यापूर्वी गावात 'जातमुक्तीचा' ठरावही मंजूर केला होता. आता त्यांनी स्वतःच्या कृतीतून कर्मकांडांमागील अनावश्यक खर्च आणि अंधश्रद्धेवर प्रहार केला आहे. मृत्यूनंतर नको, जिवंतपणी जपा या निर्णयाबाबत बोलताना शरद आरगडे म्हणाले की, माणूस जिवंत असताना त्याच्या गरजांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र, निधनानंतर समाज काय म्हणेल, या भीतीने दशक्रिया आणि तेराव्यासाठी वारेमाप खर्च केला जातो. अशा विधींमुळेच आत्म्याला मोक्ष मिळतो, हा गैरसमज दूर करण्यासाठी मी जिवंतपणीच स्वतःचे पिंडदान केले आहे. हा खर्च टाळून तो समाजोपयोगी कामासाठी वापरता येऊ शकतो. विधवा प्रथांना कायमची तिलांजली केवळ कर्मकांडांना फाटा देऊन शरद आरगडे थांबले नाहीत, तर त्यांनी स्त्री सन्मानासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आपल्या निधनानंतर पत्नीला विधवा म्हणून जगण्याची सक्ती केली जाऊ नये, यासाठी त्यांनी एक कायदेशीर प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे की, माझ्या निधनानंतर पत्नीने कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नयेत किंवा मंगळसूत्र उतरवू नये. कोणत्याही प्रकारच्या जाचक विधवा प्रथा तिच्यावर लादल्या जाऊ नयेत. सुतक पाळण्यासही बंदी शरद आरगडे यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाने कोणतेही 'सुतक' पाळू नये किंवा पारंपारिक धार्मिक विधी करू नयेत. सामाजिक परिवर्तनाची ही लाट केवळ भाषणातून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून यावी, या उद्देशाने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. सौंदाळा गावच्या या सरपंचांच्या 'विद्रोही' आणि 'सुधारणावादी' भूमिकेचे समाजातील पुरोगामी गटाकडून कौतुक होत आहे.
पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर ‘जग्वार-मिराज’चे ‘टेकऑफ’ आणि ‘लँडिंग’
सुलतानपूर : यूपीच्या सुलतानपूरमध्ये पूर्वांचल एक्सप्रेस-वेवर आज दुपारी २ वाजता लढाऊ विमानांचा एअर शो सुरू झाला आहे. सर्वात आधी वायुसेनेच्या सी २९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टने एक्सप्रेस-वेवर बनवलेल्या धावपट्टीवर (रनवेवर) लँडिंग केली. नंतर जग्वारने उड्डाण केले. सुखोई आणि मिराज फायटर जेट्सनी टेकऑफ आणि लँडिंग केली. शो पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली आहे. ६ तास चालणा-या एअर शोसाठी ५ […] The post पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर ‘जग्वार-मिराज’चे ‘टेकऑफ’ आणि ‘लँडिंग’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लेन्सकार्टमधील ‘तिलक-हिजाब’ प्रकरण चिघळले
भोपाळ : आयवेअर कंपनी लेन्सकार्टच्या ड्रेस कोडवरून वाद वाढला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये निदर्शने होत आहेत. हिंदू संघटनांशी संबंधित लोक गेल्या ४ दिवसांपासून या राज्यांमधील अनेक शहरांमधील लेन्सकार्ट स्टोअरमध्ये जाऊन कर्मचा-यांना टिळा लावत आहेत आणि कलावा बांधत आहेत. यादरम्यान, बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी कंपनीच्या प्रवर्तकांना सांगितले, ‘तू आपली […] The post लेन्सकार्टमधील ‘तिलक-हिजाब’ प्रकरण चिघळले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बंगळूरू : २०२३ च्या बंगळूरू तुरुंग कट्टरतावाद प्रकरणात एका महत्त्वपूर्ण निकालात, एनआयए विशेष न्यायालयाने सूत्रधार टी. नसीरसह सात आरोपींना दोषी ठरवले आहे. सर्व दोषींना सात वर्षांच्या सक्त कारावासाची आणि ४८,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात टी. नसीर व्यतिरिक्त सय्यद सुहेल खान, मोहम्मद उमर, झाहिद तबरेज, सय्यद मुदस्सिर पाशा, मोहम्मद फैसल रब्बानी आणि […] The post ७ दहशतवाद्यांना शिक्षा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या मतदानापूर्वी महायुतीने बारामतीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेला संबोधित करताना, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन बारामतीकरांना केले. तसेच, विरोधातील उमेदवारांवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, काहींनी केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी या निवडणुकीत आपले अर्ज दाखल केले आहेत. या सभेला महायुतीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. कारण, या पोटनिवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असून, त्या निवडणुकीच्या मैदानात आहेत. याच मुद्द्यावरून खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत खोचक टोला लगावला. घरच्याच व्यक्तीने विरोधात उमेदवारी अर्ज भरल्याचा संदर्भ देत सोनवणे यांनी मुंडेंना डिवचले आहे. बजरंग सोनवणे म्हणाले, बाहेरचे हवशे, गवशे, नवशे तिथे गेले असून आमच्या बीडच्या ताई देखील तिथे जाऊन निवडणुकीत उभारल्या आहेत. माझ्या पतीराजाला विचारून मी फॉर्म भरला, असे करुणा शर्मा (मुंडे) यांनी म्हटले होते. हा प्रकार नेमका काय? ही भानगड काय? हेच कळत नसल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे. तसेच प्रत्येक पक्षाने सुनेत्रा पवार यांना बिनशर्त पाठिंबा दिला पण निवडणूक ही कोणाची खोडी हे सुद्धा कळायला पाहिजे, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेत डिवचले आहे. दरम्यान, अजित पवारांच्या अपघात प्रकरणी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, ब्लॅक बॉक्स कुठे आहे? तपास कोणत्या दिशेने ऑफिशियली आणि अनऑफिशियली देखील माहीत नाही. महाराष्ट्राची इच्छा आहे, या गोष्टीचा तपास लागला पाहिजे आणि सत्य महाराष्ट्रासमोर आले पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येक सभेत या घटनेचा तपास सुरू आहे, असे सांगितले जाते. त्याबाबत मुख्यमंत्र्यांचे कौतुक, ते एखादी गोष्ट करायची असे म्हणतात पण कधी करणार तो दिवस कधी येणार याबाबत माहीत नाही, असे म्हणत सोनवणे यांनी टोला लगावला आहे.
रितेश-जिनिलिया देशमुख एसटीचे ब्रँड अँबेसिडर; विलासरावांच्या आठवणींना दिला उजाळा.
मुंबई: महाराष्ट्रात रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. या वादावर आता अभिनेते आणि राज्याचे नवनिर्वाचित एसटी ब्रँड अँबेसिडर रितेश विलासराव देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असायलाच हवी,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन […] The post रितेश-जिनिलिया देशमुख एसटीचे ब्रँड अँबेसिडर; विलासरावांच्या आठवणींना दिला उजाळा. appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिक TCS छळ प्रकरण: कंपनीची ‘ती’मोठी चूक उघड; POSH कायद्याच्या उल्लंघनामुळे कारवाईचा फास आवळणार!
नाशिक: एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा झालेला लैंगिक छळ आणि धर्मांतराच्या प्रयत्नाप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक कार्यालयात ५० पेक्षा जास्त महिला कार्यरत असतानाही स्वतंत्र ‘पॉश’ (POSH – Prevention of Sexual Harassment) समिती नसल्याने पीडितांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नसल्याचे पोलीस तपासात आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. तपासातील महत्त्वाचे निष्कर्ष […] The post नाशिक TCS छळ प्रकरण: कंपनीची ‘ती’ मोठी चूक उघड; POSH कायद्याच्या उल्लंघनामुळे कारवाईचा फास आवळणार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

30 C