SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

27    C
...

माळीवाडा वेशीच्या राड्यात बजेट पास; घर-पाणीपट्टी सवलतीची चर्चा बायपास:तरतुदींऐवजी महानगरपालिकेच्या कारभारावरच सभागृहात चर्चा‎

मनपाच्या सन २०२६-२०२७ च्या अंदाजपत्रकीय महासभेत अंदाजपत्रकातील तरतुदींच्या आकडेवारीऐवजी संबंधित विभागाच्या कारभारावरूनच चर्चा झडली. शेवटच्या टप्प्यात माळीवाडा वेस पाडण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गदारोळ केला. शिवसेनेने विरोध केला. याच गदारोळात अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. शुक्रवारी झालेल्या सभेत घरपट्टी सर्वेक्षण व वाढीव पाणीपट्टीच्या सवलतीसाठी चर्चा झाली. मात्र, अंदाजपत्रक मंजूर करत असताना यावर चर्चा अथवा निर्णय झाला नाही. शनिवारी दुपारी तहकूब सभा सुरू झाल्यावर विविध विषयांवर चर्चा झडली. ब्लड बँकेवर दरमहा सहा लाख रुपये खर्चून एकही पिशवी संकलित होत नाही. ही ब्लड बँक खासगी संस्थेला चालवायला द्या, अशी मागणी नगरसेवक विकास जगताप यांनी लावून धरली. नगरसेवक गणेश भोसले यांनी माळीवाडा वेशीचे महत्त्व काय असा सवाल केला. नगरसेवक संपत बारस्कर यांनी प्रशासनाने वेस न पाडल्यास आम्ही ती पाडू, असा इशारा दिला. शिवसेनेचे गटनेते दत्तात्रय कावरे आणि माजी महापौर सुरेखा कदम यांनी याला विरोध केला. दरम्यान, ब्ल्यू लाईनमध्ये अंतिम मंजुरी असलेल्या ले-आऊटमध्ये बांधकाम परवानगी का दिली जात नाही, यावरून मयूर बांगरे आणि विकास जगताप यांनी प्रशासनाला धारेवर धरले. नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक स्नेहल यादवव यांनी आधीच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या परवानग्या दिल्याचे मान्य केले. एआय इमेज महासभेत काहींनी ब्लड बँक खासगी संस्थेला चालवण्यास देण्याची मागणी केली. प्रत्यक्षात ब्लड बँक खासगी संस्थेला चालवण्यास देण्यासाठी मागील वर्षी सप्टेंबरमध्येच प्रशासकांनी निर्देश दिले आहेत. कंत्राटी कर्मचारी भरतीसाठी प्रस्तावित निविदा रद्द करून हे निर्देश दिले होते. दोन संस्थांकडून प्रस्तावही आलेले आहेत. ही माहिती मात्र प्रशासनाने सभागृहात देणे टाळले. काही नगरसेवकांना याची माहिती होती, मात्र त्यांनीही मौन बाळगले. सभागृहात यावर निर्णय दिला गेला नसला तरी या चर्चेच्या माध्यमातून खासगीकरणाला वाट मोकळी करून देण्यात आल्याचे चित्र आहे. गॅस पाइपलाइनसाठी रस्ते खोदाईच्या आदेशाला विरोध शहरात नव्याने झालेल्या रस्त्यांवर गॅस पाईपलाईनसाठी खोदाई करण्यास नगरसेवकांनी विरोध दर्शवला. नगरसेवक निखिल वारे यांनी शासनाला आमचा विरोध कळवा, असे सांगितले. नगरसेवक गणेश भोसले, बाबासाहेब वाकळे यांनीही याला विरोध केला. शासनाच्या आदेशानुसार खोदाई करण्यास विनाशुल्क परवानगी दिल्यास शहर उद्ध्वस्त होईल, अशी भीती वारे यांनी व्यक्त केली. येत्या वर्षात प्रस्तावित नवे प्रकल्प, योजना, उपक्रम • महापौर ज्योती गाडे यांनी विविध घोषणा केल्या. प्रत्येक प्रभागात नमो उद्यान' विकसित करण्यात येणार असून यात जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम आणि लहान मुलांसाठी खेळणी • महानगरपालिकेची स्वमालकीची पवन चक्की उभारण्यात येणार • चितळे रोड येथील नेहरू मार्केटच्या जागी आणि गंज बाजार, भाजी मार्केट येथे नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स • महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण आणि योगासन वर्ग, पाळणाघर • ई-वाहनांच्या चार्जिंग पॉईंटसाठी मनपाची जागा भाडेतत्वावर दिली जाणार

दिव्यमराठी भास्कर 29 Mar 2026 8:25 am

ई-गाड्यांची मागणी 60% वाढली; 15 दिवसांचे वेटिंग:ई-बाईक खरेदीकडे कल, बुकिंग केल्यानंतर काही दिवस पहावी लागणार वाट‎

आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईबाबत उडालेला गोंधळ पाहता वाहन बाजाराचे समीकरण बदलत आहे. पेट्रोल पंपावर रांगा लागल्यानंतर, इलेक्ट्रिक बाईक खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे चित्र आहे. आठवडाभरात या गाड्यांच्या मागणीत सुमारे ६० टक्क्यांपर्यंत मागणी वाढल्याचे चित्र आहे. शहरातील इलेक्ट्रिक बाईक विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन इलेक्ट्रिक बाईकला सुमारे आठ ते पंधरा दिवसांचे वेटिंग आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. अशा स्थितीत, इलेक्ट्रिक वाहन बाजारात मागणी वाढल्याचे दिसून आले. पाडव्यानंतर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीला प्रतिसाद मिळाल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. दिव्य मराठी'शी बोलताना अप्पासाहेब होले म्हणाले, पाडव्यापर्यंत दरमहा सुमारे २५० पेट्रोलच्या तर १०० इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री झाली. मागील चार दिवसांत अचानक इलेक्ट्रिकला अधिक मागणी वाढल्याचे दिसून आले. शहराभरात सुमारे १०० ते १५० गाड्या वेटिंगवर आहेत. पूर्वीपेक्षा दुप्पट मागणी वाढली असून, आखाती युद्ध संपले नाही तर इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत अधिक वाढ होऊ शकते. आमच्या एका दालनात दोन दिवसांपूर्वी २४ तासांत ४० इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री झाली. नव्याने बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना दहा ते पंधरा दिवस वाट पहावी लागणार आहे. याव्यतिरिक्त इतर दालनांमध्येही वेटिंग असल्याचे दिसून आले. याव्यतिरिक्त तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनांनाही चांगला प्रतिसाद असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. अभिमन्यू नय्यर सद्यस्थितीत इलेक्ट्रिक बाईकला ६० टक्क्यांनी मागणी वाढली आहे. परंतु, प्लँटमध्ये गॅसची अडचण आहे. वेल्डिंगशिवाय गाड्या कशा तयार होणार ? सध्याची स्थिती अशी आहे की, इलेक्ट्रिक बाईकचा स्टॉक संपत आला आहे. त्यामुळे बुकिंगनंतरही आठ ते दहा दिवस वेटिंगवर रहावे लागेल. तीन चाकी ऑटोलाही आता मागणी वाढली आहे.

दिव्यमराठी भास्कर 29 Mar 2026 8:24 am

चांगले आरोग्य असेल तरच क्रीडा क्षेत्रात मिळू शकते यश:न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल आठरे यांचे मत‎

चांगले आरोग्य असेल तरच खेळाडू आपल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. शरीर हीच खरी संपत्ती आहे, त्यामुळे प्रत्येकाने फिटनेसकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे, असे मत न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल आठरे यांनी व्यक्त केले. युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालयाच्या मेरा युवा भारत अहिल्यानगरच्यावतीने न्यू आर्ट्‌स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल या सांघिक खेळांसोबतच गोळाफेक आणि धावणे या वैयक्तिक स्पर्धांनीही रंगत आणली. अत्यंत चुरशीच्या लढतींमुळे संपूर्ण परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. महाविद्यालयाच्या जिमखाना मैदानावर खेळाडूंची लगबग पाहायला मिळाली. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल आठरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मेरा युवा भारतचे सत्यजीत संतोष, जिमखाना चेअरमन अनंत पंडित, शरद मगर, धन्यकुमार हराळ, रमेश गाडगे, श्रीकृष्ण मुरकुटे उपस्थित होते. प्रास्ताविकात शरद मगर यांनी सांघिक खेळांसोबत वैयक्तिक स्पर्धांचेही आयोजन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. शासकीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यास खेळाडूंच्या करिअरला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले. न्यू आर्ट्‌स महाविद्यालयातून अनेक दिग्गज खेळाडू घडले असून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. विशेषत: कबड्डी संघाने राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केल्याचेही त्यांनी सांगितले. उपप्राचार्य अनिल आठरे यांनी आपल्या भाषणात खेळाडूंच्या फिटनेसचे महत्त्व अधोरेखित केले. चांगले आरोग्य असेल तरच खेळाडू आपल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. शरीर हीच खरी संपत्ती आहे, त्यामुळे प्रत्येकाने फिटनेसकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 29 Mar 2026 8:23 am

हरिनाम सप्ताहामुळे मिळतो संस्कारांचा वारसा:निमगाव वाघा येथे हरिनाम सप्ताहाची सांगता, कीर्तनात भाविक तल्लीन‎

आजच्या धावपळीच्या जीवनात भक्ती, नामस्मरण आणि संतसाहित्य यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. हरिनाम सप्ताहासारख्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नवीन पिढीला संस्कारांचा वारसा मिळतो असे प्रतिपादन हभप श्रीनिवास महाराज घुगे यांनी केले. तालुक्यातील निमगाव वाघा येथे श्रीराम नवमीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याची यंदाही भक्तिमय वातावरणात सांगता झाली. संपूर्ण सप्ताहभर हरिनामाचा गजर, भजन-कीर्तन आणि ज्ञानेश्‍वरी पारायणाने गावातील वातावरण भक्तीमय बनले होते. या सोहळ्याची सांगता हभप श्रीनिवास महाराज घुगे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. त्यांच्या प्रभावी वाणीने आणि रसाळ कथनशैलीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनात घुगे महाराजांनी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांचे अत्यंत समर्पक वर्णन केले. ते म्हणाले, “भगवान श्रीकृष्णाचे चरित्र हे केवळ कथा नसून जीवन जगण्याची दिशा देणारे आहे. त्यांनी संकटांवर मात करत धर्म, सत्य आणि कर्तव्य यांचा मार्ग दाखविला. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात श्रीकृष्णाच्या तत्वांचा स्वीकार केल्यास समाजात सद्भावना आणि शांतता निर्माण होईल. आजच्या धावपळीच्या जीवनात भक्ती, नामस्मरण आणि संतसाहित्य यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. हरिनाम सप्ताहासारख्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नवीन पिढीला संस्कारांचा वारसा मिळतो. कीर्तनानंतर घुगे महाराजांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडण्यात आली. याप्रसंगी उपस्थित भाविकांनी टाळ्या वाजवत आणि जयघोष करत उत्साह व्यक्त केला. वातावरणात “गोविंदा गोपाळा” चा निनाद घुमला. या कार्यक्रमाला माधवराव लामखडे, उद्योजक बाळासाहेब शहाणे, साहेबराव बोडखे, सामाजिक कार्यकर्ते नाना डोंगरे, भागचंद जाधव, काशीनाथ पळसकर आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. या सप्ताहाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी नाथयोगी परिवारातील युवकांनी परिश्रम घेतले. यावेळी भाविक उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 29 Mar 2026 8:21 am

जावयाकडून सासऱ्याच्या घरासमोर काळी बाहुली टाकून उंबऱ्याची पूजा:काळी जादू करण्याचा प्रयत्न, महाराष्ट्र अंनिसकडून दखल, राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जावयाने सासऱ्याच्या घरासमोर लिंबू, हळदीकुंकू, काळी बाहुली टाकून उंबऱ्याची पूजा करुन काळी जादू करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार देवळाली प्रवर येथे २७ रोजी रात्री १२.४५ च्या सुमारास देवळाली प्रवरा येथील गोविंद पठारे यांच्या वस्तीवर घडला. दरम्यान, या प्रकाराने भयभीत झालेल्या पठारे कुटुंबीयांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांच्या मनातील भीती दूर केली. २७ रोजी रात्री १२.४५ च्या सुमारास देवळाली प्रवरा येथील गोविंद पठारे यांचे वस्तीवर ३ ते ४ इसम आले. त्यांनी मुख्य दरवाजा उघडून आत प्रवेश केला व घरासमोर लिंबू, हळदीकुंकू, काळी बाहुली टाकून उंबऱ्याची पूजा केली. अंगणातही पूजा सुरू केली. याची खबर खोलीत झोपलेल्या पठारे कुटुंबाला लागताच ते जागे झाले. त्यांनी दरवाजा उघडून पाहिला असता समोर तीन ते चार इसम हळदी कुंकू गुलाल टाचणी टोचलेले लिंबं, सोबत नायलॉन दोरी, कुऱ्हाड, एक गलोर असे साहित्याची पूजा करत असल्याचे लक्षात आले. पठारे कुटुंबीयांनी आरडाओरड करताच ते चारही इसम पळू लागले. त्यातील एका इसमास पठारे कुटुंबीयांनी पकडले. पठारे कुटुंबियाने जो इसम पकडला तो त्यांचाच जावई निघाला हे विशेष. त्यांनी त्यास पकडून ठेवले व पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या सोबत कुऱ्हाड,गलोल, नायलॉन दोरीही होती. आमच्या जिवीतास धोका असल्याचे पठारे कुटुंबियानी अंनिसच्या कार्यकर्त्यांना सांगितले. या घटनेमागे जो कुणी बुवा बाबा असेल ज्याने अशा प्रकारची पूजा करुन आम्हाला घालवण्याचा प्रयत्न केला. त्याचाही शोध घेऊन कारवाई करावी, अशीही मागणी पठारे कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेमुळे पठारे कुटुंबीय घाबरले होते. ही घटना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲड रंजना गवांदे, अशोक गवांदे माजी जिल्हा संघटक देविदास देसाई यांनी भयग्रस्त कुटुंबाची भेट घेतली व त्यांच्या मनातील भीती दूर केली, अशा जादूटोण्याने किंवा लिंबू, नारळाने काही होत नसते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भेटीने पठारे कुटुंबियांना मानसिक आधार मिळाला.

दिव्यमराठी भास्कर 29 Mar 2026 8:20 am

जातीभेद विसरून धर्मकार्यासाठी एकत्र यावे:श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे आवाहन‎

देव ,देश आणि धर्माच्या उत्थानासाठी संघाचे कार्य खूप प्रेरणादायी आहे. संघ स्वयंसेवक कायम देव, देश, धर्म यांचा विचार करून आपले कार्य करतात. संघ स्वयंसेवक घरोघरी जाऊन हिंदू समाजाला जागृत करण्याचे काम करीत आहे. सर्व समाजाने जातीभेद विसरून धर्मकार्यासाठी एकत्र आले पाहिजे.आपल्या कुटुंबावर मुलावर योग्य संस्कार केले पाहिजे. धर्मकार्यासाठी प्रेक्षक न होता धर्माचे रक्षक व्हा, असे आवाहनश्रीक्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी केले. समाजातील भेदभाव दूर होऊन हिंदू समाज संघटित व्हावा आणि देव, देश, धर्मासाठी कार्यरत व्हावा. या मुख्य उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी निमित्त चांदा येथील श्री दत्त साधकाश्रम या ठिकाणी हिंदू संमेलनास प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून देवगड संस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशानंद गिरीजी महाराज बोलत होते. प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाशिक विभाग बौद्धिक प्रमुख कृष्णाजी घरोटे हे होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संभाजी दहातोंडे, संघाचे नेवासे तालुका कार्यवाह सुनील सावंत उपस्थित होते. चांदा येथील जिल्हा परिषद शाळा इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील संतांच्या वेशभूषेत नाटिका सादर केली त्यामध्ये त्यांनी संतांनी दिलेले सामाजिक संदेश नाटकाच्या माध्यमातून सादर केले. प्रकाशांनंदगिरीजी महाराज व इतरांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. या संमेलनास चांदा, रस्तापूर,कौठा, घोडेगाव व परिसरातून हजारो हिंदू बांधव माता-भगिनी पुरुष बांधव उपस्थित होते. कृष्णाजी घरोटे म्हणाले, संघाच्या शाखेमध्ये आदर्श व्यक्ती निर्माण होतात,आदर्श समाज जीवनासाठी व्यक्ती निर्माण करण्याचं काम संघ आपल्या शाखेतून करत असतो. भारताला जर परम वैभवशाली, विश्वगुरू बनवायचं असेल तर समाजामध्ये आपण एक जबाबदार नागरिक म्हणून वागले पाहिजे . समाज परिवर्तित झाला की राष्ट्र आपोआप प्रबळ आणि शक्तिशाली बनेल. प्रास्ताविक योगेश्वरी दरंदले यांनी केले. त्या म्हणाल्या, या हिंदू संमेलनाच्या पूर्वतयारीच्या प्रक्रियेत चांदा गाव व परिसरातील गावांत अभुतपूर्व जनजागृती राबवण्यात आली. त्यात ७ गावांतील २ हजार २३८ हिंदू घरामध्ये गृहसंवाद अभियान राबवण्यात आले. या अभियानात ४० कार्यकर्ते सहभागी झाले होते. या हिंदू सम्मेलनाची सांगता पसायदानाने झाली. सूत्रसंचालन समितीचे सदस्य अमोल अंबाडे यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 29 Mar 2026 8:19 am

सिनेमाला साजणारी मर्डर मिस्ट्री:पोलिस महिलेने स्वतःच्या वडिलांना मिल्कशेकमधून दिले विष; प्रियकराशी बिनसल्याने 3 वर्षांनी भांडाफोड

एखाद्या मर्डर मिस्ट्री सिनेमाच्या कथेला शोभेल अशी भयंकर घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. येथील एका पोलिस महिलेने स्वतःच्या पोलिस असणाऱ्या वडिलांना मिल्कशेकमध्ये विष देऊन संपवले. या घटनेचा कुणालाही थांगपत्ता लागला नाही. पण 3 वर्षांनंतर या महिलेचे प्रियकरासोबत बिनसले आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला. त्यानंतर अवघा महाराष्ट्र हादरला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पोलिस अधिकारी जयंत बल्लावार (45) हे 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ड्युटीवर जाण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांची मुलगी आर्या जी सध्या पोलिस कर्मचारी आहे, तिने त्यांना मिल्कशेक करून दिले. वडिलांनी ते मिल्कशेक घेतले आणि कामावर गेले. त्यानंतर ते चंद्रपूरच्या जिल्हा न्यायालयाच्या प्रशासकीय इमारतीत पोहोचले, तेव्हा त्यांना चक्कर आली व ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तेव्हा या घटनेत कोणतेही गुन्हेगारी कृत्य दिसून आले नाही. त्यामुळे जयंत बल्लावार यांच्या आकस्मिक मृत्यूची फाईल बंद करण्यात आली. पण 3 वर्षांनंर अचानक पोलिसांनी जयंत बल्लावार यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांची स्वतःची मुलगी व इतर 3 जणांना अटक केली. त्यानंतर झालेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. बल्लावार यांचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता तर एक पूर्वनियोजित खून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आणि सर्वांच्या अंगाचा थरकाप उडाला. नेमकी काय घडली घटना? त्याचे झाले असे की, आर्या बल्लावार हिचे आशिष शेडमाके नामक तरुणाशी 2022 पासून प्रेमसंबंध होते. आर्याचे वडील जयंत बल्लावार यांचा या संबंधांना विरोध होता. त्यामुळे ते आर्या व आशिषच्या प्रेमात अडथळा ठरत होते. त्यामुळे आर्याने स्वतःच्या वडिलांना ठार मारण्याचा कट रचला. तिने आपला दूरचा भाऊ चैतन्य गेडाम (22) याला बोलावून घेतले. त्याला 5 हजार रुपये दिले आणि विष आणण्यास सांगितले. या प्रकरणातील चौथा व्यक्ती अद्याप समोर आला नाही. हा व्यक्ती हे विष विकणारा विक्रेता आहे. त्यानंतर 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी आर्याने आपल्या पोलिस अधिकारी असलेल्या वडिलांसाठी मिल्कशेक बनवले. त्यात हे विष टाकले. हे मिल्कशेक पिऊन जयंत बल्लावार आपल्या कर्तव्यावर निघून गेले. त्यांची ड्युटी जिल्हा कोर्टात होती. तिथे पोहोचल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली. ते खाली कोसळले आणि त्यांचा तत्काळ मृ्त्यू झाला. बल्लावर हे सर्वांपुढे चक्कर येऊन पडल्यामुळे ते चालता-बोलता गेले असा सर्वांचा समज झाला. त्यामुळे कुणीही त्यांच्या शवविच्छेदनाची मागणी केली नाही. असे उघडकीस आले हत्याकांड? जयंत बल्लावार यांच्या निधनानंतर आर्याची अनुकंपा तत्वावर वडिलांच्या जागी पोलिस म्हणून निवड झाली. त्यानंतर तिने आशिषशी लग्न केले. मधल्या काळात आशिषही पोलिसांत भरती झाला. पण बेशिस्त व घाणेरड्या वर्तणुकीमुळे त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करम्यात आली. या काळात आर्याचे आशिष सोबत वाद वाढले. त्यांच्यात नेहमी भांडणे होऊ लागली. त्यानंतर गत आठवड्यात आशिष संतापाच्या भरात पोलिस ठाण्यात गेला आणि तिथे त्याने आपल्या बायकोने अर्थात आर्याने स्वतःच्याच वडिलांना विष देऊन ठार मारल्याचे सांगितले. हे ऐकूण पोलिसांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ आशिषसह आर्या, तिचा भाऊ चैतन्य गेडाम व इतर एकाला अटक केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. पण या हत्याकांडामुळे अवघे पोलिस दल चक्रावून गेले आहे.

दिव्यमराठी भास्कर 29 Mar 2026 7:54 am

राज्यात उद्यापासून शनिवारपर्यंत पावसाचा अंदाज:मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यात गारपिटीचा अंदाज; रब्बी पिकांचे होणार नुकसान

राज्यात उद्यापासून म्हणजे 30 मार्चपासून ढगाळी वातावरण आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवे सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्यापासून प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातही काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. कधी-कुठे पावसाची शक्यता? 30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. पण या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान व वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर 1 ते 4 एप्रिलपर्यंत वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणी ढगाळी वातावरण, दुपारनंतरचा वादळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रब्बी पिकांची काळजी घ्या त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवस हवामानाच्या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत, सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, तसेच वादळी वारे, पाऊस व संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे. मेघगर्जना व विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीजेचे खांब व विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन या प्रकरणी करण्यात येत आहे. मुंबईतील हवामान कसं असेल? उल्लेखनीय बाब म्हणजे बुधवार - गुरूवारी राज्यातील काही भागांत तापमानाचा पारा 39 अंशावर पोहोचला होता. परभणी जिल्हा राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला असून बुधवारी येथे 39.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यानंतर सोलापूरमध्ये 39 अंश सेल्सिअस, तर जळगावमध्ये 38.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. मराठवाड्यातील काही भागांत पारा 37 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. या आठवड्यात होणाऱ्या पावसामुळे हा पारा उतरण्याची शक्यता असली तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 29 Mar 2026 7:24 am

आर्थिक वर्ष सरले, पण अनुदान थकीतच:27 कोटींसाठी 43 हजार शेतकरी प्रतीक्षेत, अपेक्षित होते 50 कोटी, मिळाले फक्त 2000 जणांना 22 कोटी‎

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकूण ४५ हजार १८७ शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, अवजारे व विविध आधुनिक कृषी यंत्रसामग्री खरेदी केली असून त्यासाठी शासनाकडून अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्षात अनुदान वितरणाची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने हजारो शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी आतापर्यंत १५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यानंतर कृषी आयुक्तालयाकडून आणखी ७ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून एकूण उपलब्ध निधी २२ कोटी ७५ लाखांवर पोहोचला आहे. तरीही एकूण आवश्यक निधीच्या तुलनेत सुमारे २७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी अजूनही प्रलंबित आहे. प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कृषी यांत्रिकीकरण योजना ही शेतीचे आधुनिकीकरण, उत्पादन वाढ आणि मजुरीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. मात्र, अशा योजनांमध्ये अनुदान वितरणात होणारा विलंब शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत करणारा ठरत असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्यासाठी आणखी २७ कोटी रुपयांचा निधी मिळणे बाकी असल्याने कृषी आयुक्तालयाकडून अनुदानाचा निधी कधी मिळणार, याबाबत अनुदानाच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे. Q. निवड पद्धत कशी राबवली होती? A. या वर्षी लॉटरी सिस्टिमने शेतकऱ्यांची निवड करण्यात आली नव्हती. प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य या क्रमाने निवड केली होती. Q.अनुदान कशामुळे रखडले? -अपेक्षित बजेट मिळाले नाही. आमच्याकडून शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. Q.शेतकऱ्यांना आर्थिक वर्ष संपल्यावर निधी मिळेल का? A. दोन दिवसांत जर शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही तर पुढच्या आर्थिक वर्षात अनुदान दिले जाईल. अनुदानाची प्रतीक्षा

दिव्यमराठी भास्कर 29 Mar 2026 7:24 am

राजस्व अभियानाचा जनतेने फायदा घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवून घ्यावेत:तहसीलदार सारिका भगत यांचे चिकलठाण येथे आवाहन

नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींना एकाच छताखाली मिळण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा लाभ नागरिकांनी घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवून घ्यावेत असे आवाहन तहसीलदार सारिका भगत यांनी चिकलठाण येथे केले. चिकलठाण येथे राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार भगत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना भगत म्हणाल्या की, महसूल विभागाच्या सुविधा जलद गतीने उपलब्ध करून देणे व प्रशासनातील होणाऱ्या बदलांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे शिबिर आहे. या वेळी प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी लता बागूल, माजी पंचायत उपसभापती एकनाथ चव्हाण, चंदू शहा, पंचायत समिती सदस्य मुक्तार शहा यांनी मनोगत व्यक्त केले. या शिबिरात नायब तहसीलदार नीलेश राठोड, शिवसेना विभागप्रमुख कल्याण चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. झाकीर शेख, शिवाजी धनगर, मंडळ अधिकारी पी. एस. सुरवसे तलाठी किशोर निकम, दीपक एरंडे, नितीन एरंडे, नितीन मगरे, गणेश मोहिते, राहुल सुलाने ग्रामविकास अधिकारी म्हस्के, एस. एम. पाटील, जी. एस. मोहिते, कृषी सहायक देवरे, पोलिस पाटील गणेश वेताळ, विनोद चव्हाण, योगेश गवळी, माजी सरपंच युवराज चव्हाण यांच्यासह मंडळअंतर्गत असलेल्या गावांचे महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, पोलिस पाटील, विविध गावांतील सरपंच, लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मंडळ अधिकारी पी. एस. सुरवसे यांनी केले. कवी प्रवीण दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले. वैभव तोंडे यांनी आभार मानले. या वेळी विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ५४ फेरफार निकाली, ५७ नागरिकांना सातबारा आरोग्य, पुरवठा, महिला बाल विकास विभाग, महिला बचत गट, भूमी अभिलेख, महा-ई-सेवा महसूल विभाग यांच्या वतीने लाभार्थींच्या सेवेसाठी व मदतीसाठी विविध स्टॉल लावण्यात आले होते. या वेळी ५४ फेरफार निकाली काढण्यात आले. सातबारा दुरुस्तीसंदर्भात बारा अर्ज प्राप्त झाले. ५७ नागरिकांना डिजिटल सातबारा, ३८ जणांना आठ उतारे, ४५ नागरिकांना या अभियानांतर्गत विविध प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले. एक खिडकीअंतर्गत ४४ अर्ज निकाली काढण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 29 Mar 2026 7:22 am

लासूर येथे चिमुकल्यांनी केले लक्षवेधी नृत्य, गायन:सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन‎

लासूर स्टेशन येथील सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूलमध्ये शनिवार, २८ मार्च रोजी पूर्व-प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे आणि पालकांच्या आत्मीय स्वागताने झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाचा औपचारिक समारंभ पार पडला. पूर्व-प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी नृत्य, कविता, कथाकथन, विविध कलाकृती इंग्लिश भाषेच्या माध्यमातून आपल्या सुप्त गुणांचे प्रदर्शन केले. दरम्यान, पालकांसाठी एका प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे सूत्रसंचालन कृष्णा गवळी यांनी प्रभावी केले. या स्पर्धेत शिल्पा कदम आणि रामेश्वर शेलार हे विजेते ठरले. विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना डॉ. सबिहा सय्यद आणि डॉ. इजाज सय्यद यांच्या हस्ते गुणगौरव प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आले. शाळेचे व्यवस्थापक रेव्ह. फादर संजय पारखे, मुख्याध्यापक रेव्ह. फादर रॉकी लोपेस, विजय बोरखडे आदींनी मार्गदर्शन केले व प्रमुख पाहुण्यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. पालकांनी सेंट जॉर्ज शाळेने सादर केलेल्या प्रयत्नांची मनापासून प्रशंसा केली. रेव्ह. फादर संजय पारखे आणि रेव्ह. फादर रॉकी लोपेस यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेऊन सर्वांचे आभार मानले. सिस्टर फ्लोरी, क्षितिजा त्रिभुवन, सोनाली सरोवर, शिक्षक वृंद उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 29 Mar 2026 7:22 am

पैठणमध्ये शालिवाहन जयंती साजरी:बसस्थानकाला नाव देण्याची मागणी

शहरात शनिवारी (दि.२८) तालुक्यातील कुंभार समाज संघटनेच्या वतीने शककर्ता सम्राट राजा शालिवाहनांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जुन्या पैठणमधील विजयी तीर्थ स्तंभ उद्यानात कार्यकर्त्यांनी सम्राट शालिवाहनांच्या प्रतिमेस पुष्पवृष्टी अर्पण करून अभिवादन केले. शालिवाहनांच्या जयजयकाराने परिसर दुमदुमला होता. झेंडूजी महाराज मठात झालेल्या कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी सम्राट शालिवाहनांच्या कार्यावर मनोगत व्यक्त केले. यावेळी उपनगराध्यक्ष तुषार पाटील, संजय जोरले, रामदास इंगळे, नागनाथ कुंभार, शामराजे कुंभार, दत्ताजी डहाळसकर, खटावकर, जालिंदर पंजावाले, गणेश पंजावाले, सूर्यभान घोडके, निवृत्ती जाधव, गणेश रोकडे, मनोहर तांगडे, मुरलीधर तिडके, मनोहर मरकड, साखरचंद जाधव यांची भाषणे झाली. महाराष्ट्र शासनाने पैठणच्या बसस्थानकाला सम्राट शालिवाहन यांचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली. जुन्या पैठणमधील केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या पालथी नगरीचा तत्काळ विकास करण्यासाठी कार्यवाही करावी, अशीही मागणी मांडण्यात आली. कार्यक्रमासाठी भाऊसाहेब पंजावाले, सतीश दळे, राम पंजावाले, साहेबराव रोकडे, प्रमोद पंजावाले, भागवत रोकडे, रवी पंजावाले, विठ्ठल रोकडे, अजय पंजावाले, अशोक रोकडे, कल्याण पंजावाले आदींनी पुढाकार घेतला होता.

दिव्यमराठी भास्कर 29 Mar 2026 7:21 am

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:महाराष्ट्रातील 95% देणग्या एकट्या भाजपच्या वाट्याला, भाजपच्या देणग्यांत महाराष्ट्र, दिल्ली अव्वल

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशातील ६ राष्ट्रीय पक्षांना एकूण ६,६४८.५६ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. पैकी सर्व पक्षांना मागे टाकत भाजपच्या तिजोरीत तब्बल ६,०७४ कोटी रुपये जमा झाले. त्यापाठोपाठ काँग्रेसला ५१७ कोटी तर ‘आप’ला ३८ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. उर्वरित ५ पक्षांच्या एकूण देणग्यांच्या दहापटीहून अधिक रक्कम एकट्या भाजपला मिळाली. दिल्लीनंतर महाराष्ट्रातून सर्वाधिक देणग्या दिल्याचे असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्म अर्थात एडीआरच्या (२६ मार्च) अहवालातून हे स्पष्ट झाले. महाराष्ट्रातून सर्व राजकीय पक्षांना दिलेल्या देणग्यांपैकी ९५% भाजपच्याच पारड्यात आहेत.दिल्लीनंतर महाराष्ट्र देशात दुसरा डोनर स्टेट आहे. तर गुजरात-३०९, पश्चिम बंगाल-२५४ आणि कर्नाटकमधून २२० कोटी रुपयांच्या देणग्या देण्यात आल्या आहेत. दिल्लीच्या प्रुडेंट इलेक्टोरल आणि मुंबईतील प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्टसारख्या संस्था मध्यस्थाचे काम करतात. प्रुडंटच्या देणगीदारांत कॉर्पोरेट समूह तर प्रोग्रेसिव्हमध्ये ‘टाटा’च्या कंपन्या आहेत. ‘दिव्य मराठी’ने दोन्ही ट्रस्टच्या अहवालातून टॉप १० डोनर्सची यादी मिळवली. या देणग्यांमध्ये २० हजार रुपयांखालील रकमेचा समावेश नाही.

दिव्यमराठी भास्कर 29 Mar 2026 7:14 am

खरातची कबुली:किती महिलांचे शोषण केले ते भोंदू खरातला आठवेना, कौटुंबिक, आर्थिक अडचणीतील महिला होत्या टार्गेट

कौटुंबिक,आर्थिकआणि शैक्षणिक अडचणी दूर करण्याकरिताआलेल्या काही महिलांना भोंदू खरातने नवीन घर देण्याचे आमिष दाखवले.आशीर्वादाच्या नावे ऊर्जा हस्तांतरणआध्यात्मिक उपचाराच्या नावाखाली महिलांना संमोहित केले. मी देवाचा अवतार आहे. तुम्ही खासआहात. मागील जन्माची अप्सरा असल्याचे सांगत महिलांमध्ये नैसर्गिक ओढ निर्माण केली. माइंड रीडिंगद्वारे भावनिकआणि मानसिकतेचा फायदा घेत महिलांचे पूजेच्या नावाखाली शोषण केले, अशी कबुली खरातने पोलिस कोठडीत दिली. मात्र, किती महिलांचे शोषण केले, हे आता मला आठवतही नाही असेही त्याने निर्लज्जपणे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे फाटा येथील गाडेनगरमधील ३९ वर्षीय कापड व्यापारी राजेंद्र नानासाहेब भागवत यांना खरातने २ लाख ६० हजारांना गंडा घातला. या प्रकरणी नाशिक येथे दहावा गुन्हा दाखल झाला आहे. आकर्षणाबद्दल महिलांना दोष देणे योग्य नाही महिलांबाबतचा प्रकार संपूर्णपणे स्वेच्छेने घडला नाही. ही मानसिक, भावनिक, सामाजिक प्रभावाची गुंतागुंतआहे. महिला या आधाराच्याआणि भविष्याच्या चिंतेतून गुंतत जातात. गरज पूर्ण होत नाही तिथे चुकीच्या ठिकाणीआकर्षण निर्माण होऊ शकते. विश्वासासोबत मर्यादांची जाणीव असणे गरजेचेआहे. महिलांना दोष देणे योग्य नाही. शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू भोंदू खरातचा शस्त्र परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. उत्तरासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसीत नमूद केले आहे की, खरातवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. म्हणून त्याच्याकडे शस्त्र असणे हे सार्वजनिक शांतता, सुरक्षेसाठी अत्यंत धोकेदायक आहे. या शस्त्राचा वापर करून तो फिर्यादी किंवा साक्षीदारांना धमकावण्याची दाट शक्यता असल्याने, तो शस्त्र धारण करण्यास पूर्णपणे ‘अयोग्य’ ठरत आहे. खरातला २०१२ मध्ये शस्त्र परवाना मिळाला. मात्र, या परवान्याची नोंद केवळ महसूल विभागाकडेच आहे. पोलिस दप्तरी नोंद नसताना हा परवाना कसा मिळाला. त्याचे नूतनीकरण कसे झाले, याचा शोध आता पोलिस, महसूल प्रशासन संयुक्तपणे घेत आहे. सोन्याच्या सांगून दिल्या होत्या तांब्याच्या अंगठ्या अहिल्यानगर | नेवासा येथील कापड व्यावसायिक भागवत यांना डिसेंबर २०२२ मध्ये व्यवसायाबाबत चिंता होती. त्यांच्या काकाने त्यांना खरातकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पत्नीसोबत ते खरातकडे नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकर्स लँड डेव्हलपर्स येथे गेले. खरातने खडे बसवून देतो, असे सांगत भागवत यांच्याकडून सुमारे २० ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या घेतल्या व बदल्यात धातूच्या बनावट अंगठ्या दिल्या. २ लाख ६२ हजार रुपये लुबाडले. १९ मार्च रोजी खरातविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच त्यांनी सराफाकडे त्या अंगठ्या तपासल्या असता त्या तांब्याची निघाल्या. त्यात खडा नव्हे, चिंचोका असल्याचे समजले. दिव्य मराठी ॲनालिसिस खरात हा केवळ भोंदू नव्हता, तर तो ‘माइंड रीडिंग’मध्ये तरबेज होता. महिलांच्या भावनिक आणि मानसिक परिस्थितीचा अंदाज घेऊन तो त्यांना संमोहित करायचा. गोड बोलून, तिची तारीफ करून ऊर्जा हस्तांतरणाच्या नावाखाली तो महिलांचे शारीरिक शोषण करायचा. कौटुंबिक आणि आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना तो ‘टार्गेट’ करत असे, हे आता त्याने पोलिस कोठडीत दिलेल्या जबाबातून स्पष्ट झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 29 Mar 2026 7:11 am

संभाजीनगरातून उडणाऱ्या इंडिगाेविमानाचे आता नवी मुंबईत लँडिंग:इंडिगोच्या नव्या वेळापत्रकाने संभाजीनगरकरांचा प्रवास 2 तासांनी लांबला

छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला जाणाऱ्या विमान प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच गैरसोयीची बातमी आहे. इंडिगो एअरलाईन्सने २९ मार्च ते २४ ऑक्टोबर दरम्यानचे आपले उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले असून, यामध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. आता रात्रीचे मुंबईला जाणारे विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाऐवजी थेट नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे. या निर्णयामुळे दक्षिण मुंबईत किंवा मंत्रालयात जाणाऱ्या प्रवाशांना किमान ४० किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागणार असून, त्यांच्या वेळेत आणि खर्चात मोठी वाढ होणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार, नवी मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला येणारे विमान (6E5027) सायंकाळी ७:३० वाजता उड्डाण करून रात्री ८:२५ वाजता पोहोचेल. तर परतीचे विमान (6E6093) रात्री ८:५५ वाजता उड्डाण करून रात्री ९:५० वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरेल. शहरातून मुंबईला, विशेषतः मंत्रालयाच्या कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. विमानतळ बदलल्यामुळे वेळेची बचत होण्याऐवजी प्रवास अधिकच लांबणार असल्याने, प्रवासी संख्येवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयावर शहरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी या बदलाचे स्वागत केले आहे. “नवी मुंबई आणि जुन्या विमानतळावरून मंत्रालयापर्यंत पोहोचण्यास साधारण सारखाच वेळ लागेल, नवीन विमानसेवांसाठी हे फायदेशीर ठरेल,’ असे सावे म्हणाले. तर, संभाजीनगर विमानतळ संचालक शरद येवले यांनी या नवीन सेवेचा नेमका परिणाम आठवडाभरात स्पष्ट होईल, अशी भूमिका मांडली आहे. मात्र, उद्योजक आणि विमान प्रवाशांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड म्हणाले की, “शहरातून विदेशात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नवी मुंबईहून आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी मिळण्यात अडचणी येतील. तसेच रात्रीच्या वेळी मंत्रालयाच्या कामासाठी जाणाऱ्यांना ही सेवा अत्यंत गैरसोयीची ठरणार आहे.” नवी मुंबईतून दक्षिण मुंबई गाठण्यासाठी कसरत नवी मुंबई विमानतळावरून रात्री १० वाजता उतरल्यानंतर दक्षिण मुंबईतील मंत्रालयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना आता मोठी कसरत करावी लागेल: नवी मुंबईहून संभाजीनगरसह ४६ शहरांना विमान सेवा नवी मुंबई | देशातील महत्त्वाच्या ग्रीनफिल्ड विमानतळांपैकी एक असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) पहिले उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले. रविवारपासून लागू या वेळापत्रकात ३० नवीन देशांतर्गत मार्गांचा समावेश आहे. त्यामुळे आता या विमानतळाची कनेक्टिव्हिटी छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरसह देशातील एकूण ४६ शहरांपर्यंत विस्तारली आहे. यात भोपाळ, अयोध्या, श्रीनगर, आग्रा आणि वाराणसी यासारख्या शहरांचा समावेश आहे. एप्रिल २०२६ पर्यंत नवी मुंबईहून रोज १५६ उड्डाणे : नव्या वेळापत्रकासह नवी मुंबई विमानतळावरून एप्रिल २०२६ पर्यंत दैनंदिन उड्डाणांची संख्या २२ वरून १५६ पर्यंत वाढवली जाणार आहे. वाढीव अंतर आणि वेळ जुन्या विमानतळाच्या तुलनेत अटल सेतूमार्गे हे अंतर सुमारे ३९ ते ४० किलोमीटरने अधिक आहे. मात्र, मुंबईत सुरू असलेली उड्डाणपुलांची कामे व वाहतूक कोंडीमुळे प्रवासाला प्रत्यक्षात १.५ ते २ तास लागू शकतात. खिशाला फटका अटल सेतूचा एकेरी टोल (अंदाजे २५० रुपये) व टॅक्सीचे वाढीव अंतर यामुळे प्रवाशांना ५०० ते ७०० रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड पडेल.

दिव्यमराठी भास्कर 29 Mar 2026 6:56 am

विठुरायाच्या भेटीसाठी माउलींचा पालखी सोहळा 8 जुलैला ठेवणार प्रस्थान:4 गोल, 3 उभे रिंगण होणार, 19 जुलैला पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होणार असल्याची माहिती

आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा ८ जुलै रोजी पंढरपूरला प्रस्थान ठेवणार आहे. १९ जुलैला सोहळा जिल्ह्यात प्रवेश करेल. १७ दिवस मुक्काम, ४ गोल तर ३ उभे रिंगण होणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी दिली आहे. आळंदी येथून यंदा दुपारी ३ वाजता सोहळा प्रस्थान ठेवेल. आषाढी एकादशी २५ जुलै रोजी साजरी होणार आहे. चैत्र शुद्ध दशमीला प्रथानुसार पंढरपूरच्या संत ज्ञानेश्वर महाराज मठात आळंदी संस्थानची बैठक पार पाडली. अधिक मासानिमित्ताने या वर्षी १५ ते २० दिवस सोहळा पुढे गेला आहे. त्याच दरम्यान मोठा पाऊस पडण्याची शक्यता अधिक असते. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेकडो मैल पायी चालत सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यास भाविक आसुसलेला असतो. प्रशासनाने सुरू केले नियोजन मागील वर्षी प्रशासनाने वारी सोहळ्याचे अचूक नियोजन केले होते. यंदाही तसेच नियोजन सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे पालखी सोहळ्यात ४३ ठिकाणी जर्मन हँगर मंडप, १०९ ठिकाणी वॉटरप्रूफ तंबू उभारले होते. सोहळ्याचे नियोजन ८ जुलै आळंदी येथून प्रस्थान, ९ व १० जुलै पुण्यात मुक्काम, ११ व १२ जुलै सासवड मुक्कामी, १३ जुलै रोजी जेजुरी, १४ जुलै रोजी वाल्हे मुक्कामी राहणार आहे. १५ जुलै रोजी नीरा स्नान करून पालखी लोणंद येथे मुक्कमी पुढे, १६ जुलै रोजी लोणंद येथून पुढे दुपारी पालखी चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होऊन पालखी तरडगाव येथे मुक्कामी येणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 29 Mar 2026 6:52 am

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:भोंदू ‘कॅप्टन’च्या बंगल्यात अमावास्येच्या रात्री लागायच्या बड्या नेत्यांच्या रांगा

शहरातील उच्चभ्रू वस्ती कर्मयोगीनगरमधील त्या आलिशान बंगल्यासमोरून जाताना आजही अंगावर काटा येतो. ज्या परिसरात तीन-तीन माजी आमदार वास्तव्यास आहेत, त्याच गल्लीत २०१२ च्या सुमारास भोंदू कॅप्टन खरातने ५ कोटींहून अधिक खर्च करून आपला महाल उभा केला. तृप्तबाला नाव असलेला हा बंगला केवळ त्याच्या भव्यतेसाठी नाही, तर तिथे चालणाऱ्या काळपट कृत्यांमुळे कायमच संशयाच्या भोवऱ्यात राहिला. आता लैंगिक अत्याचाराचे गंभीर पाश समोर आल्यानंतर, या बंगल्याच्या भिंतींमागे दडलेली अनेक काळी रहस्ये उघड होऊ लागली आहेत. एरव्ही खरातच्या कुटुंबातील सदस्यांचा वावर असलेल्या या बंगल्याचे रूप अमावास्येच्या रात्री पूर्णपणे पालटायचे. “अमावास्येच्या रात्री या बंगल्याबाहेर महागड्या चारचाकी वाहनांच्या रांगा लागायच्या, असे एका स्थानिक नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘दिव्य मराठी’ शी बोलताना सांगितले. राजकीय नेते, बडे अधिकारी आणि आपली ओळख लपवू पाहणारे व्हीआयपी लोक खरातच्या अधिकृत कार्यालयात न जाता, चोरट्या पावलांनी थेट या बंगल्याची पायरी चढायचे. रात्रीच्या काळोखात रंगणाऱ्या या दरबारात नक्की काय चालायचे याची चर्चा आता संपूर्ण नाशिकमध्ये वाऱ्यासारखी पसरली आहे. कॅप्टन खरातच्या लैंगिक अत्याचाराचे पाप चव्हाट्यावर आल्यानंतर कर्मयोगीनगरमधील चित्र बदलले आहे. ज्या बंगल्याकडे लोक कधीकाळी कुतूहलाने पाहायचे, तिथे आता भीती आणि संतापाचे वातावरण आहे. देशभक्तीचा देखावा, स्वच्छ प्रतिमेचा आव, केबिनमध्येच अत्याचाराचा डाव नाशिक | देशभक्तीच्या गप्पा, भिंतीवरील तिरंगा आणि हरिवंशराय बच्चन यांची ‘कोशिश करने वालों की हार नहीं होती’ ही प्रेरणादायी कविता... हे चित्र एखाद्या स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीच्या कार्यालयाचे असावे असेच कुणालाही वाटेल. पण कॅनडा कॉर्नरमधील हे २१० चौरस फुटांचे कार्यालय म्हणजे भोंदू अशोक खरातचा महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा अड्डा बनले होते. रॅगिंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी बेड्या ठोकलेल्या कॅप्टन खरातने याच झेड ब्लॅक काचांच्या आड महिलांचे शोषण करत आपल्या विकृत वासनेचा बाजार मांडला होता. त्याच्या या कार्यालयाची शनिवारी २८ मार्च रोजी फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांनी कसून तपासणी केली. खरातच्या कार्यालयात तिरंगा व प्रेरणादायी कविता लोकांचे भविष्य सांगण्याबरोबरच खरातने आपल्या कार्यालयाची रचना अत्यंत धूर्तपणे केली होती. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना आपण किती स्वच्छ प्रतिमेचे आहोत हे दाखवण्यासाठी त्याने दर्शनी भागात राष्ट्रध्वज आणि प्रेरणादायी सुविचार लावले होते. कुत्र्यांच्या भीतीने परिसरातील नागरिक भयभीत लाखोंचे विदेशी कुत्रे खरातने केवळ बंगल्याची तटबंदीच मजबूत केली नव्हती, तर सुरक्षेच्या नावाखाली तिथे दहशतीचे एक अदृश्य साम्राज्य निर्माण केले होते. बंगल्याच्या आवारात लाखो रुपये किमतीचे दोन विदेशी जातीचे कुत्रे पाळण्यात आले होते. या कुत्र्यांच्या भीतीने परिसरातील नागरिक या बंगल्याच्या साध्या सावलीलाही उभे राहण्याचे धाडस करत नसत. एक प्रकारे या श्वानांचा वापर करून खरातने आपल्या काळ्या कारनाम्यांभोवती दहशतीचे कुंपणच तयार केले होते, असे स्पष्टपणे जाणवते. यामुळे या परिसरात त्याची मोठी चर्चा कायमच असायची. नागरिकांची गर्दी खरातला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी हे कार्यालय सील केले आहे. शनिवारी पोलिस आणि फॉरेन्सिक टीमचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी या कार्यालयाची तपासणी सुरू केली. काय कारवाई होते हे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भविष्य जाणून घेण्याच्या नावाखाली या कार्यालयात सुरू असलेल्या काळ्या कृत्यांची आणि खरातच्या भोंदूपणाची नागरिकांत चर्चा रंगली.

दिव्यमराठी भास्कर 29 Mar 2026 6:50 am

चार वर्षांत मराठीचे दोन लाख विद्यार्थी घटले:तर इंग्रजीचे तीन लाख वाढले, 624 मराठी शाळांना टाळे तर 424 नव्या इंग्रजी शाळांना मान्यता

महाराष्ट्रात २०२१-२२ ते २०२४-२५ या ४ शैक्षणिक वर्षांत ६२४ सरकारी मराठी शाळा बंद झाल्यात. म्हणजेच वर्षाला १५६ तर महिन्याला १३ मराठी शाळा बंद झाल्यात. याउलट इंग्रजी शाळांना मात्र सरकार ‘रेड कार्पेट’ टाकत आहे. याच ४ वर्षांत ४२६ इंग्रजी शाळा सुरू झाल्यात. वर्षाला १०६ तर महिन्याकाठी ९ इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत. देशातही याच कालावधीत १८,७२७ सरकारी शाळा बंद झाल्यात. ८,४०० खासगी इंग्रजी सुरू झाल्यात. देशातही इंग्रजी शाळेत प्रवेशाचा आकडा दोनच वर्षांत ८.४२ कोटींवरून ९.५९ कोटींवर पोहोचला आहे. राज्यात मराठी माध्यमातील विद्यार्थी २ लाखांनी घटलेत. तुलनेने इंग्रजीचे विद्यार्थी ३ लाखांहून अधिक वाढलेत. तज्ज्ञ शिक्षकांचा आभाव, पायाभुत सुविधांकडे सरकारच्या दुर्लक्षामुळे पालकांचा कल आता पाल्यांना इंग्रजी शाळेत शिकवण्याकडे आहे. २ वर्षांत कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात २५५ मराठी शाळा बंद पडल्या आहेत. मराठी शाळा बंद होण्याची 4 कारणे पालकांचा कल इंग्रजी कडे वाढल्याने मराठीची पटसंख्या घटली. सरकारी अन् खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची भरती न होणे. सरकारी आणि मराठी शाळांना पायाभूत सुविधांचा आभाव. राज्य शासनाचा सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन दुय्यम असणे. पटसंख्येअभावी राज्यात महिन्याकाठी १३ शाळांना लागतेय टाळे 1. छत्रपती संभाजीनगर : मागील ४ वर्षांत ४२ इंग्रजी शाळांना परवानगी मिळाली आहे. तुलनेने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ११० मराठी शाळांचे क्लस्टरमध्ये समायोजन केले आहे. 2. नाशिक : शहरीकरण वेगाने होत असल्याने इंग्रजी शाळांच्या संख्येत मोठी वाढ झाली. तुलनेने मराठी शाळांच्या संख्येत घट झाली. इंग्रजी शाळांची संख्या १० ते १२ टक्यांनी वाढली. 3. जळगाव : जिल्ह्यात मराठी शाळांचा संख्या स्थिर आहे. उत्तर महाराष्ट्रातून इंग्रजी शाळांसाठी आलेले नवे प्रस्ताव सर्वाधिक जळगावचेच आहेत. 4.सोलापूर : शहरात इंग्रजी शाळांचे प्रमाण ८ टक्यांनी वाढले. मात्र कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरील हा जिल्हा असल्याने मराठी शाळा टिकवण्याचे आव्हान अधिक आहे. नाशिकला सर्वाधिक ८२ शाळांना टाळे जिल्हा मराठी इंग्रजी मराठी बंद नव्या इंग्रजीसंभाजीनगर ४,२८० ७९० ६५ ४२नाशिक ५,४१० ९४० ८२ ५५जळगाव ३,११० ४१० ४८ २८सोलापूर ३,८५० ५३० ५४ ४० केस स्टडी : करमाडच्या दोन शिक्षकी शाळेची पटसंख्या झपाट्याने घटली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाडला एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पूर्वी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत सुमारे ६० ते ७० विद्यार्थी असायचे. दोन शिक्षकी ही शाळा आता डबघाईस आली आहे. २०२५-२६ दरम्यान शाळेत फक्त ७ विद्यार्थी आहेत. त्यात इयत्ता पहिलीत एक, दुसरी आणि तिसरीत प्रत्येकी २, चौथीत २ असे एकूण ७ विद्यार्थी उरलेत. नव्या नियमानुसार २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळाही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ८९ % प्रस्ताव इंग्रजी शाळांचेच आलेत २०२५-२६ दरम्यान राज्यातील मराठी शाळांची संख्या ८५,५३३ झाली. जी वर्ष- २०२२-२३ मध्ये ८६,१५७ होती. म्हणजेच ४ वर्षांत ६२४ मराठी शाळा बंद झाल्यात. विशेष म्हणजे, नव्या शाळांच्या प्रस्तावात ८९% प्रस्ताव इंग्रजीचे आहेत.

दिव्यमराठी भास्कर 29 Mar 2026 6:46 am

एलपीजीला पीएनजीचा पर्याय!

दिल्लीत बैठक, कनेक्शनसाठी अटी, शर्थी शिथिल! नवी दिल्ली : वृत्तसंस्था इराण, इस्त्रायल, अमेरिका युद्धाचा परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे. भारतातही काही भागांत गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आता एलपीजी गॅसऐवजी पाणी कनेक्शन, वीज कनेक्शनप्रमाणेच आता पीएनजी कनेक्शनवर भर दिला जाणार आहे. कदाचित यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. दरम्यान, आज […] The post एलपीजीला पीएनजीचा पर्याय! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 29 Mar 2026 12:29 am

पहिल्याच सामन्यात बंगळुरूचा विजय

बंगळुरू : वृत्तसंस्था आयपीएल २०२६ हंगामाची सुरुवात अतिशय धमाकेदार झाली. शनिवार दि. २८ मार्च रोजी झालेल्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादवर शानदार विजय मिळवला. बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने ६ विकेट्स राखून सहज विजय मिळवत हंगामाची विजयी सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २०२ धावांचे लक्ष्य ठेवले, जे […] The post पहिल्याच सामन्यात बंगळुरूचा विजय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 29 Mar 2026 12:21 am

विदर्भ तापला, पारा ४१ अंशांवर!

ओकोल्यासह अनेक शहरांत सूर्याचा प्रकोप वाढला अकोला : प्रतिनिधी राज्यात उन्हाच्या झळा अधिकच तीव्र झाल्या असून विदर्भातील महत्त्वाच्या शहरांनी ४१ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून सूर्याचा प्रकोप वाढला आहे. विदर्भ सध्या अक्षरश: तळपत असतानाच हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. जोरदार वा-यासह येणा-या या पावसामुळे तापमानात अचानक बदल […] The post विदर्भ तापला, पारा ४१ अंशांवर! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 29 Mar 2026 12:18 am

जगावर अणुयुद्धाचे संकट!

हुथी, हिजबुल्लाहच्या युद्धातील एन्ट्रीने धोका वाढला इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईल हल्ला तेहरान : वृत्तसंस्था अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्धा आता एक महिन्यानंतर अत्यंत भीषण वळणावर पोहोचले आहे. इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर झालेले हल्ले आणि इराणने दिलेले प्रत्युत्तर यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या युद्धात आता येमेनमधील हुथी बंडखोर आणि लेबनॉनमधील हिज्बुल्लाह […] The post जगावर अणुयुद्धाचे संकट! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 29 Mar 2026 12:16 am

अमरावतीत 'टीबी मुक्त भारत अभियान'चा दुसरा टप्पा सुरू:जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सीईओंच्या हस्ते उद्घाटन

जागतिक क्षयरोग दिनाच्या औचित्याने अमरावती येथील जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयातर्फे टीबी मुक्त भारत अभियान फेज २ चे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजिता महापात्र यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. ज्योत्स्ना पोटपिटे, जिल्हा क्षय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पवार आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड उपस्थित होते. भारत सरकारच्या 'टीबी मुक्त भारत' या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टपूर्तीसाठी या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या अभियानाचे प्रमुख उद्देश्य क्षयरोगाचे लवकर निदान करणे, सर्व रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार पुरवणे, औषधोपचार पूर्ण करण्यावर भर देणे, क्षय रुग्णांचे विशेष व्यवस्थापन करणे, संपर्कातील व्यक्तींची तपासणी करणे आणि टीबी प्रतिबंधात्मक उपचार वाढवणे हे आहे. यासाठी घराघरात जाऊन टीबी स्क्रीनिंग व सर्वेक्षण तसेच जलद तपासणी केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. कुपोषित रुग्णांसाठी पोषण सहाय्य, निक्षय मित्र उपक्रमाद्वारे सामाजिक सहभाग, उच्च जोखमीच्या गटांमध्ये (एचआयव्ही, मधुमेह, कुपोषण) विशेष लक्ष आणि खाजगी वैद्यकीय क्षेत्राचा सक्रिय सहभाग हे या अभियानचे प्रमुख उपक्रम असतील. यावेळी बोलताना सीईओ संजिता महापात्र यांनी सांगितले की, टीबी निर्मूलनासाठी केवळ आरोग्य विभाग नव्हे, तर संपूर्ण समाजाने एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. 'टीबी हरेल देश जिंकेल' या घोषवाक्याखाली सर्वांनी एकत्र येऊन टीबीमुक्त भारत घडविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. डॉ. रुपाली कोरडे व डॉ. संदीप सुखसोहळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विशाल धांडे यांनी केले, तर आभार पुरुषोत्तम खडसे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गो. ग. राठी शासकीय क्षयरोग रुग्णालय आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 11:31 pm

समतादुतांनी समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी योगदान द्यावे:डॉ. बबन जोगदंड यांचे समतादुतांच्या बैठकीत प्रतिपादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या समतादूत विभागाचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी समतादुतांना समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे. भारतीय संविधान, थोर समाज सुधारकांचे समतेचे विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन, अट्रॉसिटी ऍक्ट, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय विभागाच्या योजना तसेच बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. अमरावती विभागातील अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ येथील समतादुतांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डॉ. जोगदंड यांनी समतादूतांशी संवाद साधून त्यांना कोणकोणती कामे हाती घ्यावयाची याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, समतादुतांनी प्रत्यक्ष शहरातील प्रत्येक वस्तीत आणि खेड्यापाड्यात जाऊन नागरिकांचे प्रबोधन करावे. समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा व परंपरांचे उच्चाटन करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करावी. विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय साधत गरजू लोकांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. सामाजिक सलोखा व बंधुभाव निर्माण करण्यासाठी समतादुतांनी लोकांचे कल्याणदूत म्हणून काम करावे. येणारी पिढी समताधिष्ठित घडावी, यासाठी बार्टीच्या विविध योजना समाजापर्यंत पोहोचवाव्यात. तसेच सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणाकरिता कार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी वसंत गव्हाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी अनिता गवई-राऊत यांनी केले. यावेळी विभागातील जिल्हा प्रकल्प अधिकारी महेंद्र शामदे व विभागातील सर्व समतादूत उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 11:31 pm

नांदगाव आयटीआय राज्यात तिसऱ्या क्रमांकावर:उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून निवड, उत्कृष्ट कामकाजासाठी 2 लाखांचा पुरस्कार

नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने (आयटीआय) महाराष्ट्रातील सर्व आयटीआयमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून या संस्थेची निवड करण्यात आली असून, त्यांना प्रशस्तीपत्रासह २ लाख रुपयांचा रोख पुरस्कारही मिळाला आहे. राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यभर एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल शुक्रवार, २७ मार्च रोजी घोषित करण्यात आला. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील कामकाजाच्या आधारे नांदगाव आयटीआयची निवड करण्यात आली, ज्यामुळे अमरावती जिल्ह्याची मान उंचावली आहे. संस्थेतील प्राचार्य, निदेशक आणि विद्यार्थी यांच्यातील योग्य समन्वयामुळे हे यश शक्य झाले. नाविन्यपूर्ण उपक्रम, अत्याधुनिक सुविधा आणि १०० टक्के प्रवेश क्षमता हे उद्दिष्ट संस्था दरवर्षी गाठते. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासोबतच प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर येथे विशेष भर दिला जातो. या संस्थेत स्मार्ट क्लासरूम, सर्वत्र सीसीटीव्हीची निगराणी, खेळाचे मैदान, जिम आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. तत्कालीन सहसंचालक प्रदीप घुले व विद्यमान सहसंचालक अनंत सोमकुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य नंदनसिंह भुकवाल यांच्या नेतृत्वात ही प्रगती साध्य झाली आहे. प्राचार्य भुकवाल यांनी सांगितले की, हा सन्मान संस्थेतील सर्वांनी केलेल्या सामूहिक कामाचा परिणाम आहे. नांदगाव खंडेश्वर आयटीआयला यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सन २०२१-२२ मध्ये संस्थेला विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामकाजाचा प्रथम पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २०२४ मध्ये मुंबईतील डिपेक्स राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनात आयटीआय गटातून शेतकरी मित्र या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला होता. विभागीय आणि राज्यस्तरावर सलग पुरस्कार पटकावणारी जिल्ह्यातील ही एकमेव आयटीआय ठरली आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 11:29 pm

ममदापूर सरपंचपदाचे ‘ग्रहण’ अडीच वर्षांनी सुटले:30 मार्चला अधिसूचना, 28 एप्रिलला होणार मतदान

तिवसा तालुक्यातील आखतवाडा आणि वणी ममदापूर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाची निवडणूक अखेर अडीच वर्षांनंतर जाहीर झाली आहे. यामुळे आतापर्यंत सुरू असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, गावातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. प्रशासकीय सूत्रांनुसार, या निवडणुकीची अधिसूचना सोमवार, ३० मार्च रोजी जाहीर होईल. उमेदवारी अर्ज ७ ते १३ एप्रिल दरम्यान दाखल केले जातील. १५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल, तर १७ एप्रिल रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रत्यक्ष मतदान २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडेल. २९ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येईल. या निवडणुकीत थेट सरपंचपदासोबतच ग्रामपंचायतीतील ३ रिक्त सदस्यपदांसाठीही मतदान होणार आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात दोन वेळा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र विविध कारणांमुळे प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण होते. आता अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपद महिलांसाठी राखीव होते. मात्र त्यावेळी एकही उमेदवारी अर्ज न आल्याने निवडणूक होऊ शकली नव्हती. परिणामी सरपंचपद रिक्त राहिले आणि ग्रामपंचायतीचे कामकाज प्रशासकीय पातळीवरच चालत राहिले. वॉर्ड क्रमांक १ मधील महिलांसाठी राखीव असलेली एक जागासुद्धा उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्याने रिक्तच राहिली होती. आता दोन्ही पदांसाठी निवडणूक होत आहे. इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली असून, गावात राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रचाराचे वातावरण हळूहळू रंगू लागले आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराला नवे नेतृत्व मिळाल्याने विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 11:27 pm

'शहीदांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी बुद्धीप्रामाण्यवादी व्हा' - प्रा. जाधव:अमरावती विद्यापीठात शहीद दिनानिमित्त विशेष व्याख्यान

अमरावती: शहीदांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी देशहिताचे कार्य करावे लागेल, राष्ट्रीय एकात्मता व देशाची विविधता जपावी लागेल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून बुध्दीप्रामाण्यवादी व्हावे, असे आवाहन प्रा. मधुकर जाधव यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात शहीद दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने 'शहीदांच्या स्वप्नातील भारत' या विषयावर या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे होते. अधिसभा सदस्य नितीन टाले व कैलास चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. निलेश कडू आणि विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात प्रा. जाधव यांनी भगतसिंह यांच्यावर लाला लजपतराय यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता हे सांगितले. लाला लजपतराय यांच्या निधनानंतर भगतसिंह यांनी बदला घेतला. असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यामागे भारतीयांचे विचार ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हेतू होता, जीवितहानी करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. चंदनसिंहसारख्या ब्रिटिशांची चाकरी करणाऱ्यांनाही मारण्यात आले होते. भगतसिंह यांनी अटक करवून घेतल्यानंतर कारागृहात भारतीयांना दुय्यम वागणूक मिळत असल्याने त्यांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. ब्रिटिश काळात प्रत्येक बाबीसाठी भारतीयांना आंदोलन करावे लागत होते. बाबू गेणू यांनीही भारतातील कच्चा माल ब्रिटिशांना नेण्यास मनाई केली होती, असे दाखले प्रा. जाधव यांनी दिले. आजच्या युवकांनी आपल्या ज्ञानकौशल्याचा उपयोग समाजहित आणि देशहितासाठी करावा, शहीदांचे चरित्र वाचावे, विचार आत्मसात करावेत आणि ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला. अधिसभा सदस्य नितीन टाले म्हणाले की, क्रांतिकारकांनी तरुण वयातच सर्वस्वाचा त्याग करून देश स्वातंत्र्यासाठी लढा दिला. आजच्या तरुणांनी आपल्यासमोरील आव्हानांना सामोरे जावे. विद्यार्थीही समाजात परिवर्तन घडवून आणू शकतात, असे टाले यांनी नमूद केले. कैलास चव्हाण यांनी सांगितले की, ब्रिटिशांची सत्ता उलथवण्यासाठी क्रांतिकारकांनी मोठे बलिदान दिले. अवघ्या तेवीस वर्षांच्या वयात भगतसिंह यांनी अनेक पुस्तके वाचली आणि अभ्यास केला. लाला लजपतराय यांच्याकडून त्यांनी देशभक्तीचे धडे घेतले. युवकांनी पुस्तके वाचावीत, स्वप्न पहावीत आणि पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 11:26 pm

नव्या विभागीय आयुक्त नयना गुंडे रविवारी घेणार पदभार:डॉ. श्वेता सिंघल यांची महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली

अमरावती येथे नयना गुंडे रविवारी विभागीय आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. यापूर्वीच्या आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांची महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पदी नियुक्ती झाल्याने हे पद रिक्त झाले होते. नयना गुंडे या राज्याच्या महिला व बालविकास आयुक्त म्हणून पुण्यात कार्यरत होत्या. पुण्याहून अमरावती येथे पोहोचून त्या मध्यान्हपूर्व पदभार स्वीकारतील अशी माहिती आहे. वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ. श्वेता सिंघल यांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी अमरावतीच्या विभागीय आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या बदलीचा आदेश शुक्रवार, २७ मार्च रोजी धडकला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मेळघाट आणि अमरावती विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिला. महसूल खात्यात संगणकाचा प्रभावी वापर आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्याला त्यांनी प्राधान्य दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक व क्रीडा प्रकारातही चांगली प्रगती केली. नयना गुंडे यांनी यापूर्वी विदर्भात गोंदिया येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. त्या एक उत्कृष्ट सनदी अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का वाढावा यासाठी त्या नेहमीच आग्रही राहिल्या आहेत. अमरावती येथील प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीलाही त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी मदत केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 11:24 pm

अमरावती जिल्ह्यातील 545 गावांवर जलसंकट:प्रशासनाने 19.07 कोटींचा आराखडा केला तयार, जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी एकही तालुका पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही. यामुळे प्रशासनाने ५४५ गावांना टंचाईग्रस्त घोषित केले असून, या गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी ७२२ विविध कामे निश्चित केली आहेत. या कामांसाठी जिल्हा प्रशासनाला १९ कोटी ७ लाख ५५ हजार रुपये खर्च येणार आहे. जिल्हा परिषदेने गेल्या महिन्यात प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयाकडून पाणीटंचाईच्या वास्तविकतेचा अहवाल मागवला होता. भूजल सर्वेक्षण विभागाने या अहवालाची पडताळणी करून उपाययोजनांची आखणी केली. या आखणीनुसारच १९.०७ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात पाण्याचे स्रोत मर्यादित असल्याने दरवर्षी विहिरींचे खोलीकरण, विहिरींचे अधिग्रहण आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा यांसारख्या उपाययोजना कराव्या लागतात. मात्र, यावर्षी जिल्ह्यातील सर्व चौदाही तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, विहिरींचे खोलीकरण, खासगी विहिरींचे अधिग्रहण, टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या नवीन नळ योजना, नवीन विंधन विहिरींची निर्मिती आणि स्रोतांचे बळकटीकरण अशा विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील काही गावांमध्ये हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईची झळ सुरू होते. त्यामुळे प्रशासनाने यापूर्वी ऑक्टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च असे दोन आराखडे तयार केले होते. परंतु, सर्वाधिक पाणीटंचाई उन्हाळ्यात जाणवत असल्याने, सध्याचा आराखडा जून २०२६ पर्यंतच्या कालावधीसाठी तयार करण्यात आला आहे. चिखलदरा तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याच्या स्रोतांच्या अभावामुळे दरवर्षी टँकर किंवा रस्त्याच्या स्थितीनुसार बैलगाडीने पाणीपुरवठा केला जातो. यावर्षीही १५ टँकर आणि बैलगाडीचा वापर करावा लागणार असून, त्यासाठी सुमारे ३० लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. अधिग्रहित विहिरींमधून या दूरच्या गावांना येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरू केला जाईल. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांनी सांगितले की, दरवर्षी काही गावांना बाहेरून पाणी पुरवावे लागते, त्यासाठी आराखडा तयार केला जातो. यावर्षी ५४५ गावांचा टंचाईग्रस्त गावांच्या यादीत समावेश आहे. मात्र, ही गावे कायमस्वरूपी टंचाईग्रस्त नसतात, तर दरवर्षी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे पुढील वर्षी त्यांना फायदा होतो. यामुळे काही गावांमध्ये स्रोतांचे बळकटीकरण होते आणि टंचाईचा कालावधीही कमी होतो.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 11:22 pm

रिम्पा शिवा यांचे तबला वादन तर पं. कुमार मर्डर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

लातूर : प्रतिनिधी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील संगीत विभागप्रमुख प्रा. हरिसर्वोत्तम जोशी व परिवाराच्या वतीने दि. २५ मार्च रोजी आयोजित ‘स्वर-तालनिनाद’ संगीत समारोह कोलकाता येथील प्रथितयश व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कलावंत विदूषी रिम्पा शिवा यांचे स्वतंत्र तबलावादन, धारवड (कर्नाटक), येथील पं. कुमार मर्डर यांचे शास्त्रीय गायन व लातूर येथील उदयोन्मुख तबलावादक समीहन जोशी यांच्या स्वतंत्र तबलावादनाने […] The post रिम्पा शिवा यांचे तबला वादन तर पं. कुमार मर्डर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 28 Mar 2026 11:21 pm

३ लिटर केरोसीन महिनाभर कसे पुरणार?

लातूर : प्रतिनिधी आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. शासनाने व्यावसायिक गॅस पुरवठा बंद केला आहे. या संकटामुळे निर्माण झालेली घरगुती गॅसची टंचाई दुर करण्यासाठी शासनाने आता केरोसीनचा पर्याय निवडला आहे. लातूर जिल्ह्यातील १ लाख ८ हजार किलोलिटर केरोसीनचा साठा मंजूर केला आहे. येत्या १० दिवसांत ग्रामीण भागातील रास्त भाव दुकानांमधून […] The post ३ लिटर केरोसीन महिनाभर कसे पुरणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 28 Mar 2026 11:19 pm

जलकुंभ तयार, पाईपलाईन रखडली:19 गावे चार वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत; 35 कोटींची योजना अर्धवट

घाटलाडकी येथे चारगड धरणावरून १९ गावांना पाणी पुरवण्यासाठी ३५ कोटी रुपयांची जल जीवन मिशन योजना रखडली आहे. जलकुंभ तयार असूनही पाईपलाईनचे काम थांबल्याने गेल्या चार वर्षांपासून ही गावे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कंत्राटदाराची देणी थकल्याने योजनेचे काम मध्येच थांबले आहे. केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत २०२२-२३ मध्ये ही योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेमुळे परिसरातील १९ गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या एक वर्षापासून या योजनेचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. कंत्राटदाराची बिले प्रलंबित असल्याने त्यांनी काम बंद केले आहे. उन्हाळा सुरू झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिलांना आणि ग्रामस्थांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने त्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अमरावतीचे उप अभियंता अर्जुन भुंबर यांनी सांगितले की, १९ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे काम निधी अनुपलब्धतेमुळे अर्धवट अवस्थेत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत केंद्राचा निधी उपलब्ध नसल्यामुळे कंत्राटदाराची बिले प्रलंबित आहेत आणि त्यामुळे त्यांनी काम बंद केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 11:15 pm

अमरावतीत ऑक्टोबरमध्ये राज्यस्तरीय ‘बुक फेअर’:पालकमंत्री बावनकुळे यांनी केली घोषणा

अमरावतीमध्ये ऑक्टोबर महिन्यात राज्यस्तरीय पुस्तक महोत्सव (बुक फेअर) आयोजित करण्यात येणार आहे. राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे. पालकमंत्री बावनकुळे यांनी आज, शनिवारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण केले. याचवेळी जिल्हास्तरीय पुस्तक महोत्सवाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील विविध ठिकाणी आयोजित केलेल्या पुस्तक महोत्सवांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादाला पाहूनच अमरावतीत राज्यस्तरीय बुक फेअर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, मानवी जीवनात पुस्तकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुस्तकांमुळे समाज प्रगल्भ होतो आणि अनेक क्रांती घडतात. त्यामुळे जिल्ह्यात वाचन चळवळ रुजवण्यासाठी 'गाव तिथे ग्रंथालय' हा उपक्रम राबवण्यात येईल. या उपक्रमांतर्गत गावांमध्ये असलेल्या विनावापर इमारतींची दुरुस्ती करून त्या ठिकाणी वाचनालये सुरू केली जातील.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 11:14 pm

मोझरी शेतशिवारात आग, गव्हाचे पीक जळून खाक:महावितरणच्या चुकीमुळे नुकसान झाल्याचा शेतकऱ्याचा आरोप

तिवसा तालुक्यातील मोझरी येथील शेतशिवारात दुपारी अचानक आग लागल्याने दोन एकर गव्हाचे पीक जळून खाक झाले. या घटनेत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी सुधीर होले यांनी महावितरणच्या चुकीमुळे आग लागल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास वाकलेल्या विद्युत खांबामधून ठिणग्या पडल्याने शेतात आग लागली. आगीची माहिती मिळताच शेतकरी सुधीर होले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र, कोरडे वातावरण, वाऱ्याचा वेग आणि पिकाची स्थिती यामुळे आग झपाट्याने पसरली. परिणामी, दोन एकर क्षेत्रातील गव्हाचे पीक पूर्णतः नष्ट झाले. घटनेनंतर महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित विभागाकडून पंचनामाही करण्यात आला असून नुकसानीचे मूल्यांकन सुरू आहे. शेतकरी सुधीर होले यांनी या प्रकरणी तिवसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने, संबंधित शेतकरी आणि परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे योग्य ती नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वाकलेले आणि धोकादायक विद्युत खांब तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 11:13 pm

अकोल्यात गॅस टंचाईचा पहिला बळी:सिलेंडरच्या रांगेत माजी सरपंचांचा चक्कर येऊन मृत्यू, प्रकाश आंबेडकरांची सरकारवर टीका

राज्यात सध्या सुरू असलेल्या तीव्र गॅस टंचाईचा फटका आता थेट मानवी जिवावर बेतू लागला आहे. एकीकडे कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झालेले असताना, दुसरीकडे स्वयंपाकाच्या गॅससाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. अशाच एका रांगेत उभ्या असलेल्या अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील एका ७० वर्षीय वृद्धाचा चक्कर येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. शंकरराव शिरसाट असे या मृत वृद्धाचे नाव असून, ते गावाचे माजी सरपंच होते. या घटनेमुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली आहे. अन्वी मिर्झापूर येथील यदुराज गॅस एजन्सीवर सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे देखील आपला नंबर लावण्यासाठी रांगेत उभे होते. एकीकडे भीषण उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे तासन्तास उभे राहिल्याने आलेला थकवा यामुळे त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. उपस्थित नागरिकांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. गावच्या माजी सरपंचाला एका गॅस सिलिंडरसाठी अशा प्रकारे जीव गमवावा लागल्याने अन्वी मिर्झापूर गावावर शोककळा पसरली आहे. व्यवस्थेतील त्रुटी आणि वितरणातील गोंधळामुळेच एका सामान्य नागरिकाचा बळी गेल्याची भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शिरसाटांच्या मृत्युला सरकारची नियोजनशून्यताच जबाबदार या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण होणार असल्याची पूर्वसूचना असतानाही सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. जर प्रशासनाने वेळेवर योग्य नियोजन केले असते, तर आज शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या मृत्यूला पूर्णपणे सरकारची नियोजनशून्यताच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा मी धिक्कार करतो. यापुढे गॅस सिलेंडरसाठी माणसे दगावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशी विनंतीही प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडे केली. नागरिकांची अग्निपरीक्षा राज्यात एकीकडे पारा ४० अंशांच्या वर गेल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे, तर दुसरीकडे घरगुती गॅससाठी भर उन्हात उभे राहावे लागत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस वितरणाचे वेळापत्रक कोलमडले असून, एजन्सी चालकांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. हे ही वाचा… गॅसचा तुटवडा नाही, तर रॉकेल का देताय?:भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले - अफवा पसरवण्यात भाजपचा हात कुणीच धरू शकत नाही राज्यातील इंधन टंचाई, गॅसचा तुटवडा आणि वाढत्या भोंदूगिरीच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः देशात कोरोनासारखी स्थिती पुन्हा उद्भवू शकते असे सांगून इशारा देत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील मुख्यमंत्री कशाचाही तुटवडा नसल्याच्या बढाया मारत आहेत, अशा शब्दांत जाधवांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील विसंगतीवर बोट ठेवले. तसेच गॅसचा तुटवडा नाही म्हणता, मग केरोसिन का देता? असा सवाल करत, अफवा पसरवण्यात भाजपचा कोणीही हात धरू शकत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 10:33 pm

व्यापक जनसंपर्काच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचणार 

लातूर : प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष असले तरी उत्सव साजरा करावा, असे काहींही नाही. कारण आणखी बरीच कामे राहिली आहेत. ती कामे आता संघाने प्रामुख्याने हाती घेतली असून व्यापक जनसंपर्काच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोंचणार, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांनी सांगीतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रमोद बापट लातूर येथे […] The post व्यापक जनसंपर्काच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 28 Mar 2026 10:23 pm

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांचा सन्मान

लातूर : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राबविलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणा-या राज्यातील पहिल्या पाच जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थान पटकावले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा शनिवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात सन्मान करण्यात आला. यावेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री […] The post मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांचा सन्मान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 28 Mar 2026 10:18 pm

‘बीएलओं’कडे माहिती न दिल्यास नाव वगळले जाणार

लातूर : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनामार्फत मतदार यादीचे विशेष सघन पुनरावलोकन (एसआयआर) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत मतदारांनी ‘बीएलओ’कडे माहिती न दिल्यास मतदार यादीतील नाव वगळले जाण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील अस्पष्ट फोटो, दुबार नावे आणि ‘एसआयआर […] The post ‘बीएलओं’कडे माहिती न दिल्यास नाव वगळले जाणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 28 Mar 2026 10:17 pm

सातारा जिल्हा परिषदेत 4 एप्रिलला सभापती निवड:20 मार्चच्या राड्यानंतर जिल्हा प्रशासनासमोर सुरक्षेचे मोठे आव्हान

सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण, समाजकल्याण आणि इतर दोन विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक येत्या ४ एप्रिल रोजी होणार असून, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. या पार्श्वभूमीवर २० मार्च रोजी झालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती आणि प्रशासनाची नामुष्की टाळण्याचे मोठे आव्हान आता जिल्हा प्रशासनासमोर उभे आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपने बहुमत नसतानाही अनपेक्षितपणे विजय खेचून आणला खरा, मात्र त्यावेळी झालेल्या गोंधळ आणि मंत्र्यामंत्र्यांमध्ये आणि पोलीस मंत्र्यांमध्ये जिल्ह्याची संपूर्ण राज्यामध्ये मोठी नाचक्की झाली. या संघर्षाची आग अजूनही शांत झालेली नसतानाच आता पुन्हा एकदा सातारा जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दि ४ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडेल. यापूर्वीच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असताना, आता ४ एप्रिलला जिल्हाधिकारी जिल्हा परिषद परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करणार काय याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ​सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ जागांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले होते.ज्याचा निकाल ९ फेब्रुवारीला जाहीर झाला. या निकालात २७ जागांसह भाजप जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. तर राष्ट्रवादी काँग्रेसला २० आणि शिवसेना (शिंदे गट) १५ जागांवर विजय मिळवता आला. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती असली तरी, जिल्ह्यात मात्र ही युती न झाल्याने भाजप विरुद्ध शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी असा तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. प्रचारादरम्यान एकमेकांवर झालेल्या जहरी टीकेमुळे निकालानंतरही भाजप आणि मित्रपक्षांत युती होण्याची शक्यता मावळली होती. मात्र, कोणत्याही परिस्थितीत सत्ता स्थापन करण्याचा चंग भाजपने बांधला होता. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ३३ सदस्यांचे पाठबळ मिळवण्यासाठी साम-दाम-दंड-भेदाचा वापर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. ​सत्ता स्थापनेच्या दिवशी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांना सुरक्षित स्थळावरून बसद्वारे जिल्हा परिषदेत आणले जात असताना भाजपने नाट्यमयरित्या दोन सदस्यांवर अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना जिल्हा परिषदेच्या दारात पोहोचताच पोलिसांनी ताब्यात घेतले. या गोंधळात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे आरोप झाले. प्रचंड गदारोळात राष्ट्रवादीच्या एका सदस्याचा हात जबरदस्तीने वर करून भाजपने सत्ता हस्तगत केली, ज्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. ही घटना ताजी असतानाच आता आहे. जिल्हा परिषदेत सभापती निवड होत असल्याने पुन्हा बहुमताचा विषय येणार असल्याने भाजपा आणि शिवसेना राष्ट्रवादी यामधील संघर्ष होणार की चर्चेद्वारे सभापती निवडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 9:55 pm

राजकीय अपहरण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत:झेडपी सदस्य अनिल देसाई व संदीप मांडवे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून उलट आमचेच अपहरण करत खूनाचा प्रयत्न करणाऱ्या संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले. सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांची भेट घेतल्यानंतर जिल्हाधिकारी पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यानंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी ही माहिती दिली. अनिल देसाई म्हणाले, ''ज्यांचे अपहरण झाले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला त्या बापूसाहेब शिंदे यांनी त्या दिवशी प्रत्यक्ष मतदानात सहभागी होत मतदान केले होते. तसेच त्यांनी पोलिसांसमोर आपले अपहरण झाले नसल्याचा जबाब दिला आहे. त्यामुळे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून मारहाण करणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.'' ते पुढे म्हणाले की, ''या प्रकरणी न्यायालयानेही योग्य तो आदेश दिलेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्या आदेशानुसार त्वरित कारवाई करावी. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनाही यासंदर्भात निवेदन देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.'' अनिल देसाई यांनी स्पष्ट केले की, संबंधितांवर कारवाई करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी जावे लागेल तेथे जाणार असून, प्रसंगी उच्च न्यायालयातही दाद मागणार आहोत. ''कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,'' असा इशाराही त्यांनी दिला.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 9:49 pm

शेतकरी अन् सरकारमधील 'प्रभावी दुवा' ठरणार राष्ट्रवादी किसान सभा:हिंगोलीत वसंत मानकर यांचा निर्धार, हिंगोलीत शेतकरी संवाद मेळावा

राज्यातील शेतकरी आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून राष्ट्रवादी किसान सभा काम करणार असून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष वसंत मानकर यांनी शनिवारी ता. २८ दिली आहे. राष्ट्रवादी किसान सभा पदाधिकारी व शेतकरी संवाद मेळावा सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वसंत मानकर यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, वसंत मस्के,राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा प्रदेश सरचिटणीस गणेश डोंगरे, किसान सभेचे मराठवाडा अध्यक्ष रामभाऊ हांडोळे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, रवींद्र गडदे, अशोक शिरामे, रवी डोरले, विकास शिंदे, अजय भूतनर यांच्यासह अनेक कार्यकते उपस्थित होते. यावेळी मानकर म्हणाले की, किसान सभा ही संघटना राज्यात शेतकरी आणि सरकार त्यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करून त्यावर शासनाच्या माध्यमातून उपाययोजना राबवण्यासाठी किसान सभा सक्रिय भूमिका बजावेल. शेतकरी व सरकार त्यांच्यात समन्वय साधत त्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. या प्रश्नासंदर्भात लवकरच शासन स्तरावर संबंधित विभागांना कळविले जाईल. यातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 9:44 pm

पुण्यातील गॅस एजन्सीचा पुरवठा अन् वितरण बंद:नियमभंगावर जिल्हा प्रशासनाची कारवाई, जादा दराने विक्री अन् नियमबाह्य वाटप भोवले

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या आदेशानुसार हिंजवडी येथील मे. श्री लक्ष्मी भारतगॅस या गॅस एजन्सीला व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा व वितरण तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या एजन्सीकडे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मार्फत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर विक्रीचा अधिकृत परवाना आहे. मात्र, दि. २६ मार्च २०२६ रोजी सिलेंडर वितरण करताना शासनाने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमाचे पालन न करता अनधिकृत व नोंदणी नसलेल्या व्यक्तींना सिलेंडर वाटप केल्याचे आढळले. तसेच अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने जादा दराने सिलेंडर विक्री केल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एलपीजी पुरवठ्याबाबत गैरसमज निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार संबंधित एजन्सीचा परवाना निलंबित करण्यात येत आहे. तसेच, या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) यांना दिले आहेत. भाजप नेत्याच्या पंपावर कारवाई दरम्यान, इंधन उपलब्धतेबाबत अप्रमाणित माहिती पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण केल्याप्रकरणी पुणे कॅन्टोनमेंट परिसरातील हायवे पेट्रोलियम सेंटर (पूलगेट) या पेट्रोल पंपावरील विक्री व इंधन पुरवठा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे. संबंधित पेट्रोल पंप हा भाजप नेते आणि ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे कोर कमिटी मेंबर अली दारूवाला यांचा आहे. याबाबत अली दारूवाला यांना विचारणा केली असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तेल कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित पेट्रोल पंपाकडून पेट्रोल व डिझेल तुटवड्याबाबत निराधार अफवा पसरविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाइन्स २०२४ अंतर्गत “गंभीर अनियमितता” म्हणून गणली जाते. डीलरशिप करारातील अटींचे उल्लंघन झाल्याने संबंधित कारवाई करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 9:40 pm

शेतात मिरच्या तोडणाऱ्या महिलेवर वाघाचा प्राणघातक हल्ला:पतीने आरडाओरडा केल्याने वाघ पळाला, उमरझरी येथील घटना

शेतात मिरची तोडत असताना अचानक पट्टेदार वाघाने महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना २८ मार्च रोजी सकाळच्या सुमारास उमरझरी येथे घडली. माया रामकृष्ण सोनवाणे (वय ५५,रा. उमरझरी, ता.साकोली) असे जखमी महिलेचे नाव आहे. शनिवार दिनांक २८ मार्चला सकाळी नऊ वाजता शेतात मिरच्या तोडत असताना पट्टेदार वाघाने अचानक महिलेवर हल्ला करून जखमी केले. जवळच काम करणारे तिचे पती रामकृष्ण सोनवाणे यांनी जोराने आरडाओरडा केली. लगेच आजूबाजूच्या शेतात काम करणारे सर्व शेतकरी धावून आल्याने वाघ पळाला. परंतु यात माया सोनवणे या वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उमरझरी येथील सोनवणे यांची जंगलालगत अर्धा एकर शेतजमीन असून त्यांनी त्यात मिरचीचे पिक लावले आहे. सध्या मिरची तोडण्याचा हंगाम सुरू असून सकाळी आठ वाजता माया सोनवणे व तिचे पती हे दोघेही शेतात मिरच्या तोडत असताना अचानक वाघाने माया सोनवणे यांच्यावर हल्ला केला. गळ्याला, हाताला व कानाला तसेच पाठीला नखाने ओरडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलेला वनविभागाकडून उपचारासाठी १० हजार रुपये तत्काळ देण्यात आले आहेत. उमरझरी बीट अंतर्गत येणाऱ्या शेतात भरदिवसा वाघांनी हल्ला केल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांतील दुसरी घटना दरम्यान, दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. याआधी १९ मार्च रोजी याच परिसरातील बांपेवाडा येथील वसंता मेश्राम हे मोहफूल वेचायला गेले असता त्यांना वाघाने हल्ला करून ठार केले होते. वाघाला पकडण्यासाठी वनविभाग ॲक्शन मोडवर बांपेवाडा येथील वसंता मेश्राम यांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या नरभक्षी वाघानेच हा हल्ला केला असल्याचा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे. या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी परिसरात पिंजरे लावण्यात आले असून मचाण उभारण्याचे काम सुरू आहे. सोबतच ट्रॅप कॅमेरे व लाईव्ह कॅमेरे सुद्धा लावण्यात आले असल्याचे वन विभागाने सांगितले. शीघ्र कृती दल भंडाराचे शार्पशूटर व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून वाघाचा शोध घेणे सुरू असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 9:32 pm

पुण्यातील रामवाडीत सर्वधर्म समभावाचा आदर्श:मुस्लिम खान कुटुंब तीन पिढ्यांपासून साजरा करते रामनवमी उत्सव

पुणे, प्रतिनिधी: देशभरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, पुण्यातील रामवाडी येथील एका मुस्लिम कुटुंबाने सर्वधर्म समभावाचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. खान कुटुंबाची तिसरी पिढी गेल्या अनेक वर्षांपासून रामनवमी उत्सवात सक्रिय सहभाग घेत आहे. रामवाडीतील राम मंदिरात साजरा होणाऱ्या या उत्सवात इक्रम खान हे मनापासून सहभागी होतात. त्यांच्या कुटुंबाची ही परंपरा १९३२ सालापासून सुरू आहे. त्यांचे आजोबा मोसा खान आणि वडील इसा खान यांनीही या उत्सवात सातत्याने सहभाग घेत विविध प्रकारे सहकार्य केले होते. हीच परंपरा पुढे नेत, पुणे गोल्फ क्लबचे कॅप्टन आणि उद्योजक इक्रम खान तसेच त्यांचे पुत्र अहद इक्रम खान यांनीही उत्सवात सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या या सहभागामुळे समाजात एकोपा आणि सौहार्द वाढीस लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीत सर्वधर्म समभाव, एकात्मता आणि बंधुभावाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत असताना, खान कुटुंबाने जपलेली ही परंपरा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. विविध धर्मामध्ये सामाजिक सलोखा रावा यादृष्टीने हे पाऊल स्वागतार्ह आहे. त्यांच्या या कार्याचे स्थानिक नागरिकांसह विविध स्तरांतून कौतुक होत आहे. या उत्सवाच्या वेळी संतोष देवकर, सुहास मल्लाव, विजय शितोळे, शांतीलाल गलांडे, प्रसाद देवकर, तोळेश्वर देवकर, दत्तात्रय देवकर, विजय देवकर, गोविंद गलांडे, विजय गलांडे, संदीप कांबळे, आकाश देवकर, अभिनव देवकर, कुणाल देवकर, आकाश गलांडे यांच्यासह पुणे शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 7:56 pm

नवजात बाळाच्या उपचाराचे बिल 1.25 लाखांवरून 15 हजारांवर:विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबाला मोठा दिलासा

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना मदत करण्याच्या उपक्रमांतर्गत एका नवजात बाळाच्या उपचारासाठी आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. डॉ. रिंकू मोरे-बावसकर यांच्या प्रयत्नांमुळे बाळाच्या उपचाराचे ₹१.२५ लाखांचे बिल कमी होऊन ते केवळ ₹१५ हजार झाले. पूजा रोहित मुळे यांच्या नवजात बाळाला गंभीर अवस्थेमुळे एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, बाळाचे एकूण बिल सुमारे ₹१.२५ लाख इतके झाले होते, जे मुळे कुटुंबासाठी भरणे शक्य नव्हते. या कठीण परिस्थितीत, वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर सेल अध्यक्ष, पुणे येथील डॉ. रिंकू मोरे-बावसकर यांनी तत्परतेने पुढाकार घेतला. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा केली आणि मानवी दृष्टिकोनातून हे प्रकरण मांडले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि हॉस्पिटल प्रशासनाने बिलात मोठी सवलत दिली. यामुळे एक लाख पंचवीस हजार रुपयांचे बिल कमी होऊन कुटुंबाला केवळ ₹१५ हजार इतकीच रक्कम भरावी लागली. दिलासादायक बाब म्हणजे, नवजात बाळाची प्रकृती सुधारली असून त्याला यशस्वीरित्या डिस्चार्ज देण्यात आला आहे. या मदतीमुळे मुळे कुटुंबाने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि डॉ. रिंकू मोरे-बावसकर यांचे आभार मानले आहेत. नवजात बाळाचे वडील रोहित मुळे यांनी सांगितले की, अत्यंत कठीण प्रसंगी त्यांनी आम्हाला मोठा आधार दिला. त्यांच्या मदतीमुळे आमच्या बाळाला नवजीवन मिळाले आणि आम्हाला आर्थिक दिलासा मिळाला. ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 7:52 pm

पुणे विमानतळ देशात अव्वल:प्रवासी समाधान आणि सेवा गुणवत्तेत पटकावला प्रथम क्रमांक

देशातील सर्व विमानतळांवर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवांची गुणवत्ता आणि त्यांच्या समाधानाबाबत झालेल्या सर्वेक्षणात पुणे विमानतळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यात पुणे विमानतळ देशात सर्वोत्तम ठरले आहे. सातत्यपूर्ण सेवा सुधारणा, प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सुविधा आणि कार्यक्षम व्यवस्थापनामुळे पुणे विमानतळाने हा बहुमान मिळविला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, पुणे विमानतळाने सेवा गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत गोवा विमानतळाला द्वितीय, तर इंदूर विमानतळाने तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे पुणे विमानतळाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. देशातील सर्व विमानतळांवर 'एसीआय-एसीक्यू सर्व्हे २०२५' (एअरपोर्ट क्वालिटी सर्व्हे) करण्यात आला. हे सर्वेक्षण पूर्णपणे प्रवाशांच्या अनुभवावर आधारित होते. यामध्ये विमानतळावरील स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश प्रक्रिया (चेक-इन), कर्मचारी वर्गाची वर्तणूक, उपलब्ध सोयी-सुविधा आणि समाधान अशा विविध निकषांचा विचार करण्यात आला. या सर्व आघाड्यांवर पुणे विमानतळाने बाजी मारली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ३१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, ३१ मार्च २०२६ रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. या वेळी पुणे विमानतळाच्या अधिकाऱ्यांना विशेष सन्मानित केले जाणार आहे. याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, 'पुणे विमानतळाने देशात प्रथम क्रमांक मिळवणे ही अभिमानाची बाब आहे. प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. आगामी काळातही पुणे विमानतळ प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध राहील.'

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 7:50 pm

ओळख असणे म्हणजे गुन्ह्यात सहभाग नव्हे:39 आमदार भेटून गेलेले असताना माझेच नाव का? खरात प्रकरणी केसरकरांचा पलटवार

भोंदू अशोक खरात प्रकरणात नाव ओढले गेल्याने शिवसेना नेते आणि आमदार दीपक केसरकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक नेत्यांचे खरातसोबतचे फोटो समोर आले आहेत, मात्र केवळ ओळख असणे म्हणजे संबंधित व्यक्तीच्या कृत्यात सहभागी असणे असा होत नाही, अशा शब्दांत केसरकर यांनी आपले स्पष्टीकरण दिले. या प्रकरणाशी आपला संबंध जोडण्याचा प्रयत्न हा केवळ राजकीय द्वेषापोटी केला जात असून, यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आघाडीवर असल्याचा थेट आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. आमदार दीपक केसरकर यांचा नाशिकच्या बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात संबंध असल्याचा आरोप होत आहे. दीपक केसरकर यांचे अशोक खरात याच्यासोबतचे काही फोटो देखील समोर आले आहेत. दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना, त्यांच्या खात्यातील कारभार हा अशोक खरात याच्या सांगण्यावरून होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. आता दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचा समाचार घेतला आहे. नेमके काय म्हणाले दीपक केसरकर? दीपक केसरकर म्हणाले, मी देवभक्त आहे, मी न चुकता शिर्डीला येतो. ते जे ईशान्येश्वर मंदिर आहे ते शिर्डीला येण्याच्या वाटेवर आहे. मी लहान असल्यापासून दर सोमवारी शिव मंदिरात जातो. शिर्डीला आल्यानंतर कुठल्या शिव मंदिरात जायचे? तर मग ईशान्येश्वर मंदिरात जाणे झाले, त्या निमित्ताने ओळख झाली. ओळख आहे म्हणजे त्यांच्या कुठल्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असे नाही. त्यांना वाचवण्यासाठी माझा एखादा फोन गेला असेल, तर मी दोषी आहे. पण त्यांच्याकडून जे चुकीचे कृत्य घडलेले आहे त्याची शिक्षा त्यांना झाली पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. 39 आमदार भेटून गेलेले असताना माझेच नाव का? मी कुठलीही पूजा केलेली नाही. मी फक्त ईशान्येश्वरमध्ये एकदा पूजा केली आहे. याच्या पलीकडे मी कुठलीही पूजा त्यांच्या वतीने केलेली नाही. निव्वळ ओळख असल्याबद्दल एकाबद्दल काहीतरी बोलणे चुकीचे आहे. इतकी लोकं भेटून गेले, जवळजवळ ३९ आमदार भेटून गेले, मग माझंच नाव का? हा प्रश्न आहे. अनेक लोक भेटायला येतात, त्यामुळे कोणासोबत फोटो काढले म्हणजे तो चुकीचा माणूस आहे असे होत नाही. आपल्या नावाचा वापर करून गैरसमज पसरवू नयेत, असे दीपक केसरकर म्हणाले. राजकीय द्वेषापोटी लक्ष्य केल्याचा दावा या प्रकरणाचा संबंध आपल्याशी जोडण्यामागे 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' पक्षाचे नेते, विशेषतः संजय राऊत यांचा हात असल्याचा थेट आरोप केसरकर यांनी केला. ज्यावेळी शिवसेनेत संघर्ष झाला, त्यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू मांडून विरोधकांचे मनसुबे उधळून लावले होते. त्याचा राग मनात धरून आता माझ्याबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे, असे ते म्हणाले. खरातचे कृत्य अत्यंत घृणास्पद असून त्याला कठोर शिक्षा व्हायलाच हवी, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. ठाकरे गटाचा दुटप्पीपणा उघड दीपक केसरकर यांनी यावेळी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्यांनी खरातच्या मंदिराला पाण्याची लाईन दिली, निधी उपलब्ध करून दिला, तेच लोक आज माझ्यावर बोट दाखवत आहेत. त्यांनी केले तर योग्य आणि आम्ही मंदिरात गेलो तर चुकीचे, हा दुटप्पीपणा आहे, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला. खरातच्या गुन्ह्यांची कोणतीही माहिती आपल्याला नव्हती, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार? आपल्या स्वच्छ प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दीपक केसरकर यांनी कायदेशीर इशारा दिला आहे. या प्रकरणात एकदा खरातवर आरोपपत्र दाखल झाले की, माझी खोटी बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कोणती कायदेशीर कारवाई करायची, याबाबत मी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे. सार्वजनिक जीवनातील प्रतिमा मलीन करणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा केसरकर यांनी दिला.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 7:04 pm

गॅसचा तुटवडा नाही, तर रॉकेल का देताय?:भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले - अफवा पसरवण्यात भाजपचा हात कुणीच धरू शकत नाही

राज्यातील इंधन टंचाई, गॅसचा तुटवडा आणि वाढत्या भोंदूगिरीच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः देशात कोरोनासारखी स्थिती पुन्हा उद्भवू शकते असे सांगून इशारा देत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील मुख्यमंत्री कशाचाही तुटवडा नसल्याच्या बढाया मारत आहेत, अशा शब्दांत जाधवांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील विसंगतीवर बोट ठेवले. तसेच गॅसचा तुटवडा नाही म्हणता, मग केरोसिन का देता? असा सवाल करत, अफवा पसरवण्यात भाजपचा कोणीही हात धरू शकत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक तणावाचा परिणाम भारताच्या इंधन पुरवठ्यावर होत आहे. राज्यातील विविध शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. एलपीजी सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. एलपीजी संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने आता केरोसिन देण्यात येणार आहे. तर देशात आणि राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, एलपीजी गॅस आणि पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. यावरून भास्कर जाधव यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. नेमके काय म्हणाले भास्कर जाधव? राज्यातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरून सरकारला जाब विचारताना भास्कर जाधव म्हणाले की, आज अनेक ठिकाणचे पेट्रोल पंप बंद आहेत आणि गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. जर तुमच्याकडे साठा भरपूर आहे, तर मग राज्यात बंद असलेले केरोसिन रेशनवर देण्याचा निर्णय सरकारने का घेतला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या विधानांमध्ये मोठी तफावत असून, जनतेची दिशाभूल करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. नेहरू-ठाकरेंना जबाबदार न धरल्यामुळे धन्यवाद काँग्रेसच्या काळात साडेतीनशे रुपयांना मिळणारा गॅस आज बाराशे रुपयांच्या पार गेला असूनही भाजपवाले केवळ काँग्रेसवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. आजच्या परिस्थितीला नेहरू किंवा उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असे भाजपने अद्याप म्हटले नाही, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असा उपरोधिक टोलाही भास्कर जाधव यांनी लगावला. देशात २०१४ पासून भोंदूगिरीला खतपाणी राज्यातील वाढत्या भोंदूगिरीच्या प्रकरणांनाही भास्कर जाधव यांनी थेट भाजपच्या विचारसरणीशी जोडले. २०१४ पासून देशात अंधश्रद्धेला जाणीवपूर्वक खतपाणी घातले जात असून, त्यातूनच भोंदूबुवा आणि तथाकथित साधू-महाराजांचे पेव फुटल्याचे त्यांनी नमूद केले. अनेकांना वाटते की बाबा-बुवांच्या पाया पडल्याशिवाय सत्तेचा मुकुट मिळणार नाही. राजकारण्यांच्या अशा वर्तनामुळे सर्वसामान्य जनतेमध्येही चमत्कारांवर विश्वास ठेवण्याची चुकीची प्रवृत्ती बळावत आहे. सिन्नरचे अशोक खरात प्रकरण हा याच विकृत मानसिकतेचा एक भाग आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. राजसत्ता आणि धर्मसत्तेची गल्लत भास्कर जाधव यांनी राजसत्ता आणि धर्मसत्ता या वेगवेगळ्या असायला हव्यात, असे मत व्यक्त केले. जेव्हा राजकारणी आपल्या सत्तेसाठी धर्माचा आणि अंधश्रद्धेचा वापर करतात, तेव्हा त्यांचा विवेक नष्ट होतो. अशा अघोरी प्रवृत्तींमुळे राज्याची प्रतिमा मलीन होत असून, सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी आणि जनतेला इंधन टंचाईतून दिलासा मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 6:29 pm

पुणे ग्रामीण पोलिसांना ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात चौथा क्रमांक:कोल्हापूर परिक्षेत्रात प्रथम; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अधीक्षकांचा गौरव

महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलिस दलाने २०० पैकी १४५ गुण मिळवत राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात या दलाने प्रथम क्रमांक मिळवला. मुंबईतील सह्याद्री सभागृहात आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा गौरव करण्यात आला. या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलिस विभागातील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवांचे मूल्यमापन करण्यात आले. डिजिटल प्रणालींचा वापर, ऑनलाइन सेवा, डेटा व्यवस्थापन, डॅशबोर्ड मॉनिटरिंग आणि तंत्रज्ञानाधारित निर्णयप्रक्रिया या घटकांवर विशेष भर होता. पुणे ग्रामीण पोलिस दलाने विविध डिजिटल प्रणालींची प्रभावी अंमलबजावणी केली. सीसीटीएनएस प्रणालीद्वारे एफआयआर नोंदणी, गुन्ह्यांची माहिती, तपास प्रगती आणि आरोपींची माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाली. यामुळे सर्व पोलिस ठाण्यांमध्ये रिअल-टाइम डेटा शेअरिंग सुलभ झाले आहे. 'आपले सरकार' पोर्टल अंतर्गत पुणे ग्रामीण पोलिस दलाने नागरिकांसाठी १७ विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे नागरिकांना घरबसल्या अर्ज करणे, प्रमाणपत्रे मिळवणे आणि विविध सेवा सहजपणे घेणे शक्य झाले. 'आपले सरकार ग्रीव्हन्स' प्रणालीद्वारे प्राप्त तक्रारी व अर्जांचा १४ दिवसांच्या आत निपटारा केला जात आहे. ई-ऑफिस प्रणालीमुळे कागदविरहित प्रशासनाला गती मिळाली. सर्वाधिक प्रकरणांचा जलद निपटारा करण्यात पुणे ग्रामीण पोलिस दल अग्रस्थानी राहिले. यामुळे कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमता वाढली आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट प्रणालीद्वारे नागरिकांना २४x७ तत्काळ माहिती, तक्रार नोंदणीची सुविधा आणि सेवा स्थिती तपासण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यामुळे संवाद अधिक जलद व सुलभ झाला. इंटिग्रेटेड डॅशबोर्ड आणि अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून पुणे ग्रामीण पोलिस दलाची संपूर्ण माहिती, कामगिरी, गुन्हेगारी आकडेवारी आणि विविध सेवा नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे पारदर्शकता अधिक बळकट झाली आहे. जीआयएस प्रणालीअंतर्गत रात्रगस्त दरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अचूक लोकेशन ट्रॅक करणे शक्य झाले आहे. यामुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत जवळचे पोलिस ठाणे सहज ओळखता येते आणि तात्काळ मदत मिळते. डायल ११२ आपत्कालीन सेवा अंतर्गतही उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली आहे. कमी वेळेत नागरिकांना प्रतिसाद देण्यावर विशेष भर दिल्याने आपत्कालीन सेवांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या “पोलिस पॅड” प्रणालीद्वारे ४ ते १० हजार लोकसंख्या असलेल्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अचूक मनुष्यबळ नियोजन करण्यात आले. या प्रणालीमुळे योग्य ठिकाणी योग्य पोलिस कर्मचारी तैनात करणे शक्य झाले असून, भीमा-कोरेगाव तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यांसारखे मोठे बंदोबस्त अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले.संदीप सिंह गिल, पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली “६० Days” आणि “९० Days” पायलट प्रकल्प राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा, सेवा वितरणातील गती आणि अंतर्गत समन्वय सुधारण्यात महत्त्वाची प्रगती झाली आहे. पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम पोलिस प्रशासन उभारणे ही काळाची गरज असून, पुणे ग्रामीण पोलिस दल या दिशेने सातत्याने प्रयत्नशील राहील. ही कामगिरी संपूर्ण पुणे ग्रामीण पोलिस दलासाठी अभिमानास्पद असून, राज्यातील इतर पोलिस दलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे,असेही गिल म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 5:54 pm

किल्ले रायगड येथे शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम:346 व्या पुण्यतिथीनिमित्त दुर्गसंवर्धन परिषद, मान्यवरांची उपस्थिती

किल्ले रायगड येथे १ आणि २ एप्रिल २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची ३४६ वी पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आणि दुर्गसंवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९५ साली स्थापन केलेल्या या मंडळाने १९२५-२६ मध्ये रायगडावरील शिवछत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार केला होता. त्या कार्याला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असल्याने, ही परिषद विशेष महत्त्वाची ठरली आहे. या कार्यक्रमासाठी राज्यसभेचे खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक आनंद पाळंदे यांना 'श्रीशिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. तसेच, नागपूरकर भोसले घराण्याचे वंशज श्रीमंत मुधोजीराजे भोसले आणि निवृत्त ब्रिगेडीयर संग्राम मोहिते यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. शाहीर विक्रम अवचिते यांचा शाहिरी कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. शिवपुण्यतिथीच्या आदल्या दिवशी दुर्गसंवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत प्रा. प्र. के. घाणेकर, डॉ. सचिन जोशी आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांची सत्रे व मार्गदर्शन होणार आहे. मान्यवरांच्या मुलाखतींचाही यात समावेश करण्यात आला असल्याचे आयोजक यांनी सांगितले आहे. कार्यक्रमासाठी रायगडावर न्याहरी, भोजन, निवास, स्वच्छतागृहे आणि महिलांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन करावे, असे आवाहन मंडळाचे पदाधिकारी पांडुरंग बलकवडे आणि सुधीर थोरात यांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 5:53 pm

पुणे जिल्हा परिषद ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात प्रथम:मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सीईओ गजानन पाटील यांचा गौरव

पुणे जिल्हा परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या मूल्यमापनात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. परिषदेला २०० पैकी १९६.२५ गुण मिळाले आहेत. तसेच, 'सेवाकर्मी' कार्यक्रमातही जिल्हा परिषदेची प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. या यशाबद्दल मुंबईतील सह्याद्री सभागृहात आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यात आले होते. यामध्ये कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर तसेच भौगोलिक माहिती प्रणाली या सात महत्त्वाच्या घटकांवरील कामगिरी विचारात घेण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेने डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात अनेक अभिनव उपक्रम राबवले आहेत. यामुळे नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा उपलब्ध झाल्या आहेत. इंटिग्रेटेड वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम, 'स्पंदन', ई-लॉटरी, सिस्टिम ऑफ पेन्शन इलस्ट्रेशन आणि क्यूआर कोड आधारित कर संकलन प्रणाली यांसारख्या नाविन्यपूर्ण प्रणाली जिल्हा परिषदेने विकसित केल्या आहेत. परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ द्विभाषिक, सुरक्षित आणि सुलभ असून, नागरिकांना सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळतात. 'आपले सरकार' प्रणालीत १०० टक्के सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ई-ऑफिस प्रणालीमुळे कागदविरहित प्रशासनाला गती मिळाली असून, हजारो नस्ती जलद निकाली काढण्यात आल्या आहेत. तसेच, इंटिग्रेटेड स्मार्ट डॅशबोर्डद्वारे डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया सक्षम झाली आहे. 'पुणे झेडपी संवाद' या व्हॉट्सअॅप एआय चॅटबॉटद्वारे नागरिकांना २४x७ माहिती व सेवा मिळत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ब्लॉकचेन आणि जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करून मालमत्ता व्यवस्थापन, आरोग्य सेवा आणि विकास नियोजन अधिक प्रभावी करण्यात आले आहे. या यशाबद्दल बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, 'डिजिटल प्रशासन ही काळाची गरज आहे. पुणे जिल्हा परिषद नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनासाठी सतत प्रयत्नशील राहील आणि राज्यातच नव्हे तर देशातही एक आदर्श मॉडेल म्हणून उभी राहील.' पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले, 'पुणे जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा सन्मान केवळ गुणांचा नाही, तर नागरिककेंद्रित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशासनाच्या आपल्या वचनबद्धतेचा गौरव आहे. भविष्यातही नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध राहील.'

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 5:52 pm

डॉ. कलमाडी हायस्कूलमध्ये सुरेश कलमाडी स्पोर्ट्स सेंटरचे उद्घाटन:अत्याधुनिक बास्केटबॉल कोर्टसह क्रीडांगण सज्ज

कन्नड संघाच्या डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलमध्ये सुरेश कलमाडी स्पोर्ट्स सेंटर आणि नव्याने विकसित क्रीडा मैदानाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या गणेशनगर येथील शाळेत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुरेश कलमाडी यांच्या पत्नी मीरा कलमाडी, कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे, सचिव मालती कलमाडी, उपाध्यक्ष इंदिरा सालियन, डॉ. नारायण हेगडे, अद्विक फाउंडेशनचे आदित्य भारतीय आणि पायल कलमाडी-भारतीय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरेश कलमाडी यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी हे स्पोर्ट्स सेंटर सुरू करण्यात आले आहे. पुणे शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात ओळख मिळवून देण्यात कलमाडी यांचे मोठे योगदान होते. यामध्ये पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन, महाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा नगरीची निर्मिती आणि २००८ च्या कॉमनवेल्थ युथ गेम्सचे यजमानपद मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या सेंटरमध्ये दोन अत्याधुनिक बास्केटबॉल कोर्ट तयार करण्यात आले आहेत. डॉ. कलमाडी शामराव शाळेतील या क्रीडा मैदानासाठी अद्विक फाउंडेशनने ६५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. सुरेश कलमाडी यांचे वडील डॉ. शामराव कलमाडी यांनी पुण्यात स्थायिक झालेल्या कन्नड कुटुंबातील मुलांना मातृभाषेत शिक्षण मिळावे या उद्देशाने कन्नड संघाची स्थापना केली होती. यावेळी बोलताना मीरा कलमाडी यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार राहिलेल्या सुरेश कलमाडी यांना खेळाची खूप आवड होती. त्यांनी पुण्यात प्रथम मॅरेथॉन स्पर्धा सुरू केली, ज्यात सुरुवातीला ३०० जणांनी सहभाग घेतला होता. कालांतराने या स्पर्धेची लोकप्रियता वाढली आणि खेळाडूंची संख्या तीन लाखांपर्यंत पोहोचली. मुलांनी खेळात सहभागी होऊन देशाचे नाव मोठे करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मालती कलमाडी म्हणाल्या, मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे हा संस्थेचा उद्देश आहे. खेळाच्या माध्यमातून मुलांना मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते. ही सुविधा एक पायलट प्रोजेक्ट असून, कालांतराने संस्थेच्या इतर शाळांमध्येही त्याचा विस्तार करण्यात येईल. मुलांमधील क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अद्विक फाउंडेशनचे आदित्य भारतीय यांनी स्पष्ट केले की, भारतामध्ये क्रीडा संस्कृती वाढविण्यात सुरेश कलमाडी यांचे मोठे योगदान राहिले आहे. खेळामुळे करिअरला आकार मिळण्यास मदत होते आणि खेळात एक वेगळी ताकद असते.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 5:49 pm

पीसीसीओईला नॅशनल हेल्थ क्लेम स्पर्धेत प्रथम क्रमांक:'क्लेमसिंक एआय'साठी 5 लाखांचे बक्षीस, IIT हैदराबाद येथे पार पडली स्पर्धा

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) द्वारे आयोजित 'नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज हॅकॅथॉन २०२६' स्पर्धेत पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (PCCoE) च्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विजयाबद्दल त्यांना पाच लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले. ही स्पर्धा आयआयटी हैदराबाद येथे पार पडली. या विजयी संघात तृतीय वर्षाचे विद्यार्थी अभिषेक निकम, तृप्ती सुकाळे, कोसदा भट आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी हर्षिल बियाणी व अंश दुधे यांचा समावेश होता. पीसीसीओईचे संचालक व प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. अनुराधा ठाकरे आणि सह प्राध्यापक डॉ. सांत्वना गुडधे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 'अ‍ॅक्सिलरेटिंग हेल्थ क्लेम्स जर्नी' या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा आयआयटी हैदराबाद, एनआरसीइएस, जनरल इन्शुरन्स कौन्सिल, गुगल, इंडिया इन्सुरटेक असोसिएशन आणि एनएचसीएक्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. देशभरातील नवोन्मेषक, स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून भारताच्या आरोग्यसेवा डिजिटल क्षेत्रात बळकटी देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. पीसीसीओईच्या कॉम्प्युटर एआय एमएल विभागातील विद्यार्थ्यांनी 'प्रोब्लेम सॉल्व्हिंग ३' या विभागात देशभरातील अनेक प्रतिभावान स्टार्टअप्सना मागे टाकत हा विजय मिळवला. त्यांनी 'क्लेमसिंक एआय' नावाचा एक नाविन्यपूर्ण उपाय विकसित केला. हा प्लॅटफॉर्म जटिल आणि असंरचित आरोग्य विमा कागदपत्रांना संरचित, इंटरऑपरेबल डिजिटल डेटामध्ये रूपांतरित करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे आणि प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकणे हा एक समृद्ध अनुभव असल्याचे पीसीसीओईचे संचालक व प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 5:37 pm

रामटेकडी पोलिस चौकीचे आयुक्तांच्या हस्ते भूमिपूजन:अमितेश कुमार म्हणाले - दसऱ्याला होणार उदघाटन; गुन्हेगारी रोखण्यावर भर

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते रामटेकडी परिसरात नवीन पोलिस चौकीचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. नागरिकांच्या मागणीनुसार, बांधकाम व्यावसायिक नाईकनवरे कुटुंबियांच्या वतीने ही चौकी उभारण्यात येत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या चौकीचे उद्घाटन होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमाला हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, झोन पाचच्या पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके, स्थानिक नगरसेविका हेमलता मगर, हेमंत नाईकनवरे, रणजित नाईकनवरे, गौरी नाईकनवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, गेल्या वर्षी पुण्यातील १२ नवीन पोलिस ठाण्यांना राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. राज्यात सर्वाधिक १८०० नवीन पोलिस कर्मचाऱ्यांची भरती पुणे शहरात होत आहे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नवीन पोलिस ठाण्यांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल. अमितेश कुमार यांनी रामटेकडी परिसरातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या तीस हजार नागरिकांच्या सुरक्षेवर भर दिला. त्यांनी अधिकाऱ्यांना या भागाचे मॅपिंग करून अवैध धंदे करणारे आणि १० वर्षांखालील गुन्हेगार यांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले. अशा व्यक्तींना सुधारण्याची संधी द्यावी, मात्र सुधारणा न झाल्यास त्यांची परेड काढण्याच्या कडक सूचनाही त्यांनी दिल्या. ऑक्टोबरमध्ये रामटेकडी भागात घडलेल्या एका घटनेनंतर नागरिकांचे शिष्टमंडळ आपल्याला भेटले होते, असे कुमार यांनी सांगितले. त्यावेळी अवघ्या २४ तासांत कंटेनरमध्ये तात्पुरती पोलिस चौकी सुरू करण्यात आली होती. रामटेकडी परिसरातून गुन्हेगारी हद्दपार करून 'रामराज्य' आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपला प्रभाग ड्रग्ज आणि अवैध धंदेमुक्त करण्यासाठी योजना सुरू करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. आमदार चेतन तुपे यांनी सांगितले की, नवीन तीन मजली पोलिस चौकीमुळे रामटेकडी भागाची सुरक्षा वाढेल. त्यांनी क्रेडाईसारख्या संस्थांनी पुढाकार घेऊन रामटेकडी येथील महापालिकेच्या शाळेचे नूतनीकरण करण्याची गरज व्यक्त केली. नाईकनवरे कुटुंबियांच्या वतीने हेमंत नाईकनवरे यांनी सांगितले की, राज्य सरकारने झोपडपट्टी पुनर्वसनासाठी उत्तम नियमावली तयार केली आहे. या भागात चांगले रुग्णालय उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच, परिसरातील नागरिकांसाठी मल्टिप्लेक्स, फिरण्यासाठी उत्तम सुविधा आणि मुलांसाठी मोफत क्लासेस व चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यावरही ते विचार करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 5:36 pm

लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कडक कारवाई:मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, म्हणाले - देशात इंधनाचा तुटवडा नाही

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या जागतिक तणावाचा परिणाम भारताच्या इंधन पुरवठ्यावर होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यातच देशात पुन्हा 'लॉकडाऊन' लागणार असल्याच्या अफवांनी नागरिक धास्तावले असून पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत सर्व संभ्रम दूर केला आहे. देशात किंवा राज्यात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही; अशा खोट्या बातम्या पसरवणे हे देशद्रोहासारखेच आहे, अशा कडक शब्दांत त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांना फटकारले आहे. तसेच अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करू, असा सूचक इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचे पडसाद भारतीय बाजारपेठेत उमटत आहेत. एलपीजी सिलेंडर मिळण्यास होणारा विलंब यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पसरत आहेत. यावर मुख्यमंत्री म्हणाले, देशात आणि राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, एलपीजी गॅस आणि पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा आहे. आपल्या देशाच्या डिप्लोमॅटिक रिलेशनशीपमुळे, पंतप्रधानांच्या नीतीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होणार नाही, त्याची काळजी घेतली जात आहे. अशा अफवा पसरवून जर कुणी गोंधळाची स्थिती निर्माण करत असेल तर ते देशविरोधी काम आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. एलपीजी टंचाईवर 'पीएनजी'चा उतारा मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भविष्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा भासू नये, यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. राज्यात गॅस सिलिंडरची टंचाई जाणवू नये म्हणून सगळीकडे पीएनजी कनेक्शन घेण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. पाईप गॅस लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याबाबतचा एक शासन निर्णय काढण्यात आला आहे. सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी अटी-शर्ती शिथील केलेल्या आहेत. या गॅस पाईप लान टाकल्या तर एलपीजीची गरज भासणार नाही. आपल्या देशावर कोणताही नकारात्मक परिणाम नाही देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजूबाजूच्या देशात लॉकडाऊन सुरू असताना आपल्या देशात मात्र त्यावर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी त्याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर पडू दिला नाही. एलपीजी गॅसचाही कुठेही तुटवडा नाही. देशात जर कुणी अफवा पसरवून गोंधळाची स्थिती निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अफवांना बळी न पडण्याचे नागरिकांना आवाहन जागतिक घडामोडींमुळे इंधनाच्या किमतींवर किंवा पुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो, मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. नागरिकांनी कोणत्याही अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये किंवा घाबरून जाऊन साठा करू नये. प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 5:10 pm

मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतलयं

बारामती : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातामध्ये दुर्देवी निधन झाले. आज त्यांच्या निधनाला दोन महिने पूर्ण होत आहेत. त्या निमित्त त्यांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट केली आहे. त्या म्हणाल्या, ‘आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले […] The post मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतलयं appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 28 Mar 2026 5:08 pm

भोंदू खरातसोबत मुख्यमंत्र्यांचेही फोटो; असिम सरोदेंची टीका

मुंबई : प्रतिनिधी विधिज्ञ असिम सरोदे यांनी भोंदू अशोक खरातसोबत फोटो असल्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राला मूर्ख समजत आहेत का? तुम्ही अंधश्रद्धा बाळगणारे आहात, तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा. खरात प्रकरणात स्वत:चा बचाव करत इतरांवर कारवाईचे आदेश देत आहात. खरातसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो आहेत यावर मुख्यमंत्री काय बोलणार […] The post भोंदू खरातसोबत मुख्यमंत्र्यांचेही फोटो; असिम सरोदेंची टीका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 28 Mar 2026 5:04 pm

‘वैयक्तिक’ कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ २ ओळींच्या राजीनाम्यावर उतरला

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे तथा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरातशी कथित संबंध असल्याच्या मुद्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धारेवर धरले आहे. रुपाली चाकणकर यांनी भोंदू अशोक खरातशी असलेल्या कथित संबंधांवरून शुक्रवारी रात्री राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यामुळे […] The post ‘वैयक्तिक’ कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ २ ओळींच्या राजीनाम्यावर उतरला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 28 Mar 2026 5:00 pm

अशोक खरातला सुया टोचून - टोचून मारायला हवे:भोंदूगिरीवर सुधीर मुनगंटीवार कडाडले, एका दिवसासाठी कायदा बदलण्याची मागणी

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरातून समोर आलेल्या स्वयंघोषित 'कॅप्टन' अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या प्रकरणावर आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावर अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान आहे, असे म्हणत मुनगंटीवार यांनी अशा भोंदू बाबांविरोधात एक दिवसासाठी कायदा बदलून त्यांना 'सुया टोचून टोचून मारण्याची' शिक्षा दिली पाहिजे, असे विधान केले आहे. स्वतःला अंकशास्त्र आणि कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ म्हणवून घेणारा अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर सिन्नरच्या मिरगाव येथे 'श्री ईशान्येश्वर मंदिर' संस्थानच्या आडून आपले काळे साम्राज्य चालवत होता. एका ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, सध्या हा तपास अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. नेमके काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार? सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित करत, अशा नराधमांना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, मी कायद्यावर विश्वास ठेवणारा एक सुजाण नागरिक आहे, पण जेव्हा टीव्हीच्या माध्यमातून मी अशोक खरातचे अघोरी कारनामे पाहतो आणि ऐकतो, तेव्हा माझ्यासारख्या माणसाच्याही मनात येते की याला कायद्याची कोणतीही सवलत मिळू नये. 'नो कोर्ट, नो कचेरी'; याला फक्त भर चौकात सुया टोचून फासावर लटकवले पाहिजे. मुनगंटीवारांनी व्यक्त केली खंत २१ व्या शतकात आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराजांच्या विचारांचे शिक्षण शाळांमधून देतो. मात्र, अशा प्रकारचे भोंदू बाबा समाजाला तर त्रास देतातच, पण हिंदू धर्मालाही बदनाम करण्याचे काम करत आहेत, अशी खंत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. इतर भोंदू बाबांना इशारा गेला पाहिजे मुनगंटीवार म्हणाले, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, जिथे स्त्रीला देवाच्या बाजूचे स्थान दिले जाते. मात्र, या भोंदू बाबाने स्त्रियांचा अवमान करून प्रत्यक्ष देवाचा आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी देशातील सर्व भोंदू बाबांना निरोप गेला पाहिजे की—'याद रखो तुम्हारी मौत पक्की है! नेमके प्रकरण काय? स्वतःला 'कॅप्टन' म्हणवून घेणारा अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्याचा बनाव करून नाशिक आणि सिन्नर परिसरात वावरत होता. त्याने सिन्नरच्या मिरगाव येथे ‘श्री ईशान्येश्वर मंदिर’ नावाने एक मोठे संस्थान उभारले होते. अंकशास्त्र आणि कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ असल्याचे भासवून तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. एका ३५ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, खरातने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला, त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. एसआयटी तपासात धक्कादायक खुलासे आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा मुळापासून तपास करत आहे. आतापर्यंतच्या तपासात खरातच्या संदर्भात अत्यंत संतापजनक माहिती समोर आली आहे. पोलिसांना खरातच्या डिजिटल उपकरणांमधून तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत, ज्यामध्ये अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे पुरावे आहेत. भोंदू खरातकडे २०० कोटींची संपत्ती? अशोक खरातची नाशिक, सिन्नर आणि शिर्डी परिसरात सुमारे २०० कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता असण्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच त्याच्या फार्महाऊसवर टाकलेल्या छाप्यात पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मोठी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 4:44 pm

हिंगोलीचे सीईओ विवेक गायकवाड यांना शासनाचा उत्कृष्ठ सेवाकर्मी पुरस्कार:मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पाठीवर कौतुकाची थाप

राज्य शासनाच्या १५० दिवस कार्यक्रमात उत्कृष्ठ कामगिरी केल्या बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना शनिवारी ता. २८ मुंबई येथे विशेष कार्यक्रमास सेवाकर्मी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने १५० दिवसांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यानुसार मुख्यकार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, केशव गड्डापोड, विजय बोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, समाज कल्याण अधिकारी गीता गुट्टे, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रियंका राजपूत, शिक्षणाधिकारी आसावरी काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मदतीने विविध उपक्रम राबविले. यामध्ये सर्वप्रथम जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कार्यालय मध्ये ई ऑफिस प्रणाली राबविण्यात आली. याशिवाय मागील अनेक दिवसापासून रखडलेल्या पदोन्नत्या मार्गी लावल्या. कार्यालयीन कामकाजामध्ये शिस्त यावी यासाठी बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यात आली. याशिवाय प्रलंबित कामांचा निपटारा, कागदपत्रांचे अ, ब, क, ड वर्गीकरण, कर्मचाऱ्यांची कर्मयोगी पोर्टलवर नोंदणी करून प्रत्येकी पाच अभ्यासक्रम पूर्ण केले. कार्यालयातील कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या शिवाय जिल्हा परिषदेतील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा देखील उगारला. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मूल्यमापनामध्ये हिंगोली जिल्हा परिषदेला शंभर पैकी ८० गुण मिळाले आहेत. या गुणांच्या आधारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना सेवाकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आज मुंबई येेथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यकार्यकारी अधिकारी गायकवाड यांना उत्कृष्ठ सेवाकर्मी पुरस्कार देण्यात आला. यावेळी मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 4:26 pm

खरातकडे जाणारे ‘ते’ ४० आमदार कोण?

मुंबई : प्रतिनिधी नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचा संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणामुळे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी मोठी मागणी करत काही सवाल उपस्थित केले आहेत. नाशिकमधील भोंदू अशोक खरातला विमानांची सोय करून देणारे सरकारमधील ‘ते’ बडे नेते कोण? असा […] The post खरातकडे जाणारे ‘ते’ ४० आमदार कोण? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 28 Mar 2026 4:06 pm

राज्यात गॅस, पेट्रोलसाठी रांगाच रांगा

मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू झालले एलपीजी गॅस, पेट्रोलचे संकट काही संपता संपण्याचे नाव घेत नाही. राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर (२८ मार्च) आज रोजीही भल्या मोठ्या रांगा दिसल्या. मुंबई, पुण्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये तर दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. तर काही ठिकाणी तर थेट मारामा-या होतानाही दिसत आहेत. जालन्यातील पेट्रोल पंपावर एका टोळक्याने […] The post राज्यात गॅस, पेट्रोलसाठी रांगाच रांगा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 28 Mar 2026 4:04 pm

नेपाळचे माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना अटक

काठमांडू : वृत्तसंस्था नेपाळचे माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना अटक करण्यात आली आहे. बालेन शाह यांनी पंतप्रधान होताच मोठी कारवाई केली आहे. शाह यांनी सत्ता स्थापन करताच विरोधकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान बालेन शाह यांनी कॅबिनेट बैठकीत माजी पंतप्रधान ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. […] The post नेपाळचे माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 28 Mar 2026 3:42 pm

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला 2 महिने पूर्ण:काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणीत; सुनेत्रा पवार आठवणीने व्याकुळ

अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज 2 महिने पूर्ण झाले. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना आज त्यांची आठवण दाटून आली. त्यांनी आपल्या भावना एका पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत. आज तुम्हाला जाऊन 2 महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. अजित पवारांच्या खासगी विमानाने त्या दिवशी सकाळी पावणे 9 च्या सुमारास बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला. त्यानंतर वैमानिकाने दुसऱ्या प्रयत्नांत पुन्हा विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी विमान धावपट्टीपासून काही अंतरावर खोल खड्ड्यात कोसळले. त्यात अजित पवारासंह 5 जण ठार झाले. या दुर्घटनेला आज 2 महिने पूर्ण झाले. पण या दुर्घटनेचा तपास व त्यावरील राजकारण अद्याप संपले नाही. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. खाली वाचा सुनेत्रा पवारांची पोस्ट जशीस तशी सुनेत्रा पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, दादा, आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते आणि त्याचवेळी दैनंदिन राजकीय व सामाजिक कामकाजात तुमचे अस्तित्वही जाणवत राहते.तुमच्यातील लोकाभिमुख - विकासाभिमुख व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ, कामासाठीची झपाटलेली वृत्ती आणि प्रत्येक निर्णयामागची दूरदृष्टी हे सगळेच मला कायम मार्गदर्शन करण्याचे काम करतील. तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होता. तुमच्यामुळे अनेकांना दिशा मिळाली, संधी मिळाली आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळाली. शिव - शाहू - फुले - आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची वाटचाल तुमच्या प्रेरणेनेच अखंड सुरू आहे. लोककल्याणासाठी निर्णय घेताना या परिस्थितीत तुम्ही काय केले असते, हा विचार मनात ठेवून मी प्रत्येक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करते. सुनेत्रा पुढे म्हणतात, तुमच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, ही जाणीव मनाला कायम टोचत राहते. पण तुम्ही दिलेली शिकवण, तुमचे विचार आणि तुमचा वारसा हेच आता पुढचा मार्ग उजळवणारे दीप आहेत. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक आठवण मनात कायमची कोरलेली आहे. तुमच्या शब्दांमधील ताकद मला उभे राहण्याची ऊर्जा देते. दादा, तुमची उणीव शब्दांत मांडणे अशक्य आहे. पण तुमची स्वप्ने, तुमचे कार्य आणि तुमचे विचार पुढे नेण्याचा निर्धार मी कायम मनाशी जपेन. तुम्ही दाखवलेली दिशा आणि दिलेली मूल्ये हीच आमची प्रेरणा आणि मार्गदर्शक राहतील. भावपूर्ण आदरांजली, असे त्या म्हणाल्यात. सुप्रिया सुळे, रोहित पवार, तटकरेही भावूक दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सु्प्रिया सुळे, आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनीही या प्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि आपणा सर्वांचे लाडके अजितदादा यांना आपल्यातून जाऊन दोन महिने झाले. दादा जणू अजूनही आपल्या अवतीभवती आहेत असंच वाटतं. We miss you, Dada, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तर रोहित पवारांनी आठवणींचे 2 महिने, ये प्यार और संघर्ष आखिर तक चलता रहेगा, असे नमूद करत या दुर्घटनेच्या चौकशीसाठी आपला सुरू असलेला संघर्ष असाच सुरू राहील असा निर्धार व्यक्त केला आहे. सुनील तटकरे यांनी अजितदादांच्या विना दोन महिने अकल्पनीय, ही पोकळी कधीच भरून निघणार नाही, असे नमूद करत त्यांच्या आठवणींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. अमोल मिटकरींची खास कविता आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणी एका कवितेवाटे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. खालील फोटोत वाचा त्यांची कविता...

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 3:19 pm

बाजारात तेजीला विराम; ९ लाख कोटींचे नुकसान

मुंबई : जागतिक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याने शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सलग दोन दिवसांच्या तेजीला विराम देत प्रमुख निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक कोसळले. यामुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात ८.९१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सेन्सेक्स १,६९०.२३ अंकांनी घसरून ७३,५८३.२२ वर बंद झाला. निफ्टीही ४८६.८५ अंकांनी घसरून २२,८१९.६० वर स्थिरावला. अमेरिका-इराण तणावामुळे […] The post बाजारात तेजीला विराम; ९ लाख कोटींचे नुकसान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 28 Mar 2026 3:10 pm

आता प्लास्टिकही महागले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इराण-अमेरिका युद्धामुळे केवळ पेट्रोल-डिझेलच नाही, तर आता तुमच्या स्वयंपाकघरातील प्लास्टिकचे डबे, बादल्या आणि अगदी औषधांच्या किमतीही कडाडणार आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे कच्च्या मालाच्या (पॉलिमर) किमतीत मोठी वाढ झाली आहे. भारतातील कंपनी कडउछ ने २५ मार्च रोजी प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ केल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. […] The post आता प्लास्टिकही महागले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 28 Mar 2026 3:09 pm

रशिया १ एप्रिलपासून पेट्रोल निर्यात थांबविणार

मॉस्को : वृत्तसंस्था रशिया-युक्रेन युद्धाच्या चौथ्या वर्षी आणि मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशांतर्गत इंधन पुरवठा सुरक्षित करण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. रशियाने १ एप्रिल २०२६ पासून पेट्रोलच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत किमती स्थिर ठेवणे आणि पुरवठा सुरळीत ठेवणे हे यामागचे मुख्य कारण असल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियामध्ये […] The post रशिया १ एप्रिलपासून पेट्रोल निर्यात थांबविणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 28 Mar 2026 3:04 pm

इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागेल

तेहरान : वृत्तसंस्था मध्यपूर्वेतील युद्धाने आता अत्यंत भीषण आणि निर्णायक वळण घेतले आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील महत्त्वाच्या पोलाद कारखान्यांसह अणू प्रकल्पांवर धडाधड क्षेपणास्त्रे डागत इराणला मोठा दणका दिला आहे. या हल्ल्यांनंतर इराण कमालीचा संतापला असून, या कृत्यासाठी इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागेल आणि याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा थेट इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद […] The post इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 28 Mar 2026 2:58 pm

कदाचित 3 महिन्यांनी LPG बंद होईल:अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचे मोठे विधान; PNG गॅसच्या जोडण्या वाढवण्यावर दिला भर

राज्यातील विविध शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कदाचित 3 महिन्यांत एलपीजी गॅस बंद होईल असे पोटात गोळा उठवणारे विधान केले आहे. सध्या पीएनजी गॅस स्वस्त पडत आहे. त्यामुळे त्याचा अधिकाधिक वापर झाला पाहिजे. केंद्राच्या एका पत्रकात 3 महिन्यांनी कदाचित एलपीजी बंद होईल असा उल्लेख आहे. त्यामुळे आपण पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या घेतल्या पाहिजेत, असे ते म्हणालेत. नवी दिल्लीत आज केंद्रीय शहरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर व केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या नेतृत्वात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे, तसेच एका निश्चित कालावधीत पीएनजी सेवांचा विस्तार करण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यानंतर महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री मंत्री छगन भुजबळ यांनी वरील विधान केले. पीएनजीचा अधिकाधिक वापर करण्यावर भर भुजबळ म्हणाले, देशातील निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी गॅसचा पुरवठा सुलभपणे कसा करता येईल? त्यात कोणत्या अडचणी आहेत याचा आढावा घेण्यासाठी आज दिल्लीत सर्व राज्यांच्या सचिवांना आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना बोलावण्यात आले होते. या बैठकीला केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, प्रल्हाद जोशी व मनोहरलाल खट्टर उपस्थित होते. त्यांनी सर्वच राज्याचे मंत्री व सचिवांना काही सूचना केल्या. त्यानुसार, पीएजी गॅस सध्या स्वस्त पडत आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. त्याचा जास्त प्रसार झाला पाहिजे. केंद्र सरकारच्या एका पत्रकात कदाचित 3 महिन्यांनी एलपीजी बंद होईल असा उल्लेख होता. त्यामुळे आपण पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करून घेतल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी यासंदर्भात काम करणे शक्य आहे, तिथे ते सुरू केले पाहिजे. सगळ्या नगरपालिकांनी पीएनजीच्या जोडण्या वाढवल्या पाहिजे. पाण्याचे व वीजेचे कनेक्शन असल्यावरच इमारतींना ओसी दिली जाते. त्याप्रमाणेच आता पीएनजी कनेक्शनच्या सक्तीची अट टाकली पाहिजे. आपल्याला पीएनजी जोडण्या लवकरात लवकर करायच्या आहेत. पाईपलाईन टाकण्यासाठी विविध विभागांना परवानग्या मागितल्या जातात. पीएनजी मिळाली असे समजावे. या परवानग्या 24 तासांत दिल्या जातील. पीएनजी काम करणाऱ्यांना 24 तास परवानगी राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पेट्रोल पंपांवरही मिळणार केरोसीन छगन भुजबळांनी यावेळी गॅस टंचाईमुळे केरोसीनचा अधिकाधिक वापर करण्यावरही भर दिला. ते म्हणाले, राज्य सरकारकडे केरोसिन उपलब्ध होते. पण आपण ते देऊ शकत नव्हतो. कारण, उच्च न्यायालयाने त्यावेळी एक आदेश दिला होता. आता आपण न्यायालयाला कळवले आहे. त्यानुसार, जिथे एलपीजी व पीएनजीचा कमी आहे, तिथे केरोसीनचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. ज्या जुन्या डिलर्सच्या परवान्यांचे नुतनीकरण प्रलंबित होते, त्यांनी ते झाले असे समजून कामाला लागावे. या प्रकरणी पेट्रोल पंपावर केरोसीनचे टँकर उभे करून तेथून पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे भुजबळ म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 2:46 pm

खरात प्रकरणात दोन्ही 'राष्ट्रवादी' समोरासमोर:जयंत पाटील यांना सहआरोपी करावे असे रोहित पवारांना वाटते का? परांजपेंचा सवाल

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी गट या मुद्द्यावरून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांना सहआरोपी करण्याची मागणी केल्यानंतर, अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जोरदार पलटवार केला आहे. आनंद परांजपे म्हणाले की, शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार यांच्या सांगण्यावरणं विकास लवांडे यांनी हा आरोप केला नाही ना? अशी शंका मला येते. त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे होते. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे अनेक फोटो आणि भेटी भोंदू अशोक खरातसोबत झाल्या आहेत. त्यात जयंत पाटील यांना सुद्धा सहआरोपी करावे अशी मंशा रोहित पवारांची आहे का? अशी भावना माझ्या मनात येते. दुसऱ्याचे वाकून बघायची प्रवृत्ती लवांडेंच्या आरोपांना उत्तर देताना आनंद परांजपे यांनी अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या बघायचे वाकून ही त्यांची प्रवृत्ती आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी विधानसभेत आधीच स्पष्ट केले आहे की, खरातला मदत करणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रत्येक व्यक्तीची कठोर चौकशी होईल. मला तर ही शंका येते की आमदार रोहित पवारांच्या सांगण्यावरून त्यांनी हा आरोप केला नाही ना? असा सवालही त्यांनी केला आहे. खरातवर कारवाई झालीच पाहिजे रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी कालच राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचे परांजपे यांनी नमूद केले. भोंदू बाबावर कडक कारवाई झालीच पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. मात्र, राजकीय हेतूने कोणालाही अडकवण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. लवांडेंची मागणी काय? रुपाली चाकणकर यांनी राजीनामा देऊन काही होणार नाही. यांना खरात प्रकरणात सहआरोपी करण गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सुनील तटकरे यांना देखील सहआरोपी करण गरजेचं आहे, अशी मागणी या प्रकरणात शरद पवार गटाचे विकास लवांडे यांनी केली होती.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 2:14 pm

हिंगोलीच्या पालकमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा:क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा, ऑनलाईन बैठकांतून मंजूर झालेली कामेही रद्द करण्याची मागणी

हिंगोली जिल्ह्याचे झेंडामंत्री म्हणून ओळख निर्माण झालेल्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथीत व्हिडिओ प्रकरणामुळे हिंगोलीचे नाव धुळीला मिळाले असून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करून ‘आर्थिक हिताची’ कामे करणाऱ्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा शासनाने राजीनामा घ्यावा अशी मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी सांगितले की, हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून झिरवाळ यांची निवड झाल्यानंतर त्यांनी हिंगोलीच्या पहिल्याच दौऱ्यात हिंगोली गरिब जिल्हा असल्याचे सांगत जिल्हावासीयांच्या जखमेवर मिठ चोळले. पहिल्याच भेटीतून ते जिल्हयात काय विकास करणार हे स्पष्ट झाले होते. हिंगोलीत ध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थिती लावणाऱ्या पालकमंत्री झिरवळांनी हिंगोली जिल्ह्यात कधीही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आवाज उठविला नाही. हिंगोली जिल्हयात मागील दोन ते तीन वर्षापासून शेतकरी अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतरही पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी दिल्या नाहीत. हिंगोली जिल्हयातील शेतकऱ्यांच्या पिकविम्याच्या प्रश्‍नावर त्यांनी काधीही विमा कंपनीला धारेवर धरले नाही. विमा कंपनीने केवळ 25 टक्के अग्रीम रक्कम दिल्यानंतर पुढील रक्कम शेतकऱ्यांना दिलीच नाही. त्याकडेही पालकमंत्री झिरवाळ यांनी लक्ष दिले नाही. हिंगोली जिल्हयाच्या नियोजन समितीच्या बैठका घेतांना ऑनलाईन बैठका घेतल्या. यामध्ये शेतकऱ्यांना वेळेवर रोहित्र मिळत आहे किंवा नाही याची साधी विचारणाही त्यांनी केली नाही. आजही रोहित्रासाठी शेतकऱ्यांना विज कंपनीच्या चकरा माराव्या लागत आहेत. एकीकडे लिगो प्रकल्पामुळे हिंगोलीचे नाव अंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले असून दुसरीकडे पालकमंत्री झिरवाळांच्या कथीत व्हिडिओने हिंगोलीचे नाव मात्र पार धुळीला मिळाले आहे. त्यामुळे केवळ आर्थिक हिताची कामे जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेली कामे रद्द करावीत तसेच पालकमंत्री झिरवाळ यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी दिला आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 1:43 pm

कळमनुरीत वाळू माफियांना दणका:पिंपरी शिवारात कयाधू नदीत 4 बोटींची होळी, 11 हायवा अन् 4 जेसीबी जप्त

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी शिवारामध्ये कयादू नदीच्या पात्रातून बोटीद्वारे होणारा वाळू उपसा थांबवून महसूल विभागाच्या पथकाने चार बोट जाळून नष्ट केल्या आहे. तसेच आकरा हायवा व चार जेसीबी असा सुमारे साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महसूल पथकाच्या या कामगिरीने बोटीद्वारे वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे हिंगोली जिल्ह्यांमध्ये कयाधू, पूर्णा या नदीवरील काही वाळू घाटांचा लिलाव झाला आहे. मात्र या लिलावानंतर वाळू उपसा करताना चक्क बोटीचा वापर केला जात असल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे बोटीद्वारे वाळू उपसा करू नये असे स्पष्ट करण्यात आले असतानाही त्याकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. याप्रकरणी तहसील प्रशासनाकडे तक्रारीही केल्या जात होत्या. दरम्यान या तक्रारीनंतर सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुमार मीना, मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे, आनंद काकडे, प्रेम चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी साईनाथ वानखेडे, महेश गळाकाटू, प्रसन्न देशमुख, विशाल पतंगे, एकनाथ कदम, महसूल सेवक संतोष मुधोळ आकाश पुलाते चंद्रकांत पाटे यांच्या पथकाने शुक्रवारी तारीख 27 पिंपरी बुद्रुक परिसरात भेट देऊन पाहणी केली. या पथकाच्या पाहणीमध्ये बोटीद्वारे वाळूचा उपसा होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे या पथकाने चार बोट जप्त करून जाळून नष्ट केल्या आहे. याशिवाय पथकाने याच भागातून वाळू वाहतूक करणारे सुमारे आकरा हायवा चार जेसीबी असा साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जेसीबी व हायवा ट्रक आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. दरम्यान महसूल विभागाच्या या कारवाईमुळे बोटीद्वारे वाळू उपसा करणाऱ्या कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणात महसूल विभागाकडून काय कारवाई केली जाणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 1:39 pm

भोंदू बाबा ऋषीकेश वैद्यला अटक:पुणे पोलिसांनी पिंपरीत ठोकल्या बेड्या; ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत महिलेवर केला होता बलात्कार

अंगात दैवी शक्तीचा संचार असल्याचा दावा करत एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या भोंदू ऋषीकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी पिंपरी येथून अटक केली आहे. एका 35 वर्षीय पीडित महिलेने या भोंदू बाबा विरोधात फिर्याद दाखल केली होती. त्याने ‘मी तुझा शंकर, तू माझी पार्वती’ म्हणत महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित महिला मूळची पुण्यातील आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये तिची समाज माध्यमातून वसई येथील ऋषीकेश वैद्य याच्याशी ओळख झाली होती. पीडित महिला व्रतवैकल्ये करत असल्याने, वैद्यने तिला आपल्या जाळ्यात ओढले. 'माझ्या अंगात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची, याचे तंत्र मी तुला शिकवतो,' असे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, 2023 मध्ये आरोपी पुण्यात आला. त्याने मांजरी परिसरात पीडित महिलेची भेट घेतली. तिथे त्याने महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तिला पुन्हा वसई येथे बोलावून तिथेही तिच्यावर अत्याचार केल्याचे महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद आहे. वसईत गुन्हा दाखल, नंतर मांजरी पोलिस ठाण्यात वर्ग नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यातील या पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. सुरुवातीला तिने वसई येथील माणिकपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर वसई पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी पुण्यातील हडपसर भागातील मांजरी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. ऋषीकेश वैद्य याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 4 पथके नियुक्त केली होती. ही पथके आरोपीचा कसून शोध घेत होती. त्यात आरोपी ऋषीकेश वैद्य पिंपरी परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने त्याला अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली. पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले की, ऋषीकेश वैद्यने आणखी काही महिलांवर अत्याचार केल्याची शक्यता आहे. दैवी शक्तीचा संचार झाल्याची बतावणी करून त्याने महिलेवर अत्याचार केले आहेत. अशा प्रकारची कुणाची तक्रार असल्यास पीडित महिलांनी पुणे पोलिसांकडे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. हे ही वाचा… कोकाटेंचे मंत्रिपद कापण्यासाठी खरातचा तटकरेंना फोन:शरद पवार गटाचा दावा; चाकणकर अन् तटकरेंना सहआरोपी करण्याची मागणी राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्री करू नये म्हणून भोंदू अशोक खरातने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना फोन केला होता, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला होता. या प्रकरणी त्यांनी कोकाटेंना त्यांच्याकडे असलेली माहिती पुढे आणण्याचेही आवाहन केले आहे. प्रस्तुत प्रकरणात सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करून त्यांचे व्यवहार तपासले पाहिजेत. कारण अशोक खरात एकटा नसून, त्याची एक मोठी टीम आहे, असेही शरद पवार गटाने म्हटले आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 1:03 pm

टीव्ही अभिनेत्याची मोलकरणीकडे शरीर सुखाची मागणी:नकार देताच छाती, पोट, गळ्यावर वार; ठाण्याच्या मीरा रोड परिसरातील घटना

विविध टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्याने लैंगिक सुख देण्यास नकार देणाऱ्या एका 37 वर्षीय मोलकरणीची गळा चिरून हत्या केल्याची भयंकर घटना मुंबई लगतच्या ठाणे जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपीला विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, आशिष मेश्राम असे आरोपीचे नाव आहे. तो एक टीव्ही अभिनेता आहे. त्याने काही मालिकांमध्ये कामही केले आहे. ते ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड रस्त्यावरील चंद्रेश अकॉर्ड सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये राहत होता. बुधवारी रात्री मृत मोलकरीण त्याच्याकडे काम करत होती. त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. पण मोलकरणीने त्यास नकार दिला. अखेर संतापलेल्या आरोपीने तिचा गळा, छाती व पोटावर चाकूने सपासप वार केले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पण पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर त्याला आंध्र प्रदेशातून बेड्या ठोकल्या. आरोपी अनेक महिन्यांपासून करत होता छळ पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असताना त्यात काही धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी आशिष मेश्राम मोलकरणीकडे गत अनेक दिवसांपासून लैंगिक सुखाची मागणी करत होता. पण मोलकरणीने त्याची मागणी वारंवार धुडकावून लावली होती. त्यानंतरही आरोपी तिचा छळ करत होता. गंभीर बाब म्हणजे गत जानेवारी महिन्यात आरोपीने मोलकरणीच्या मुलाला फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. तुझ्या आईने माझ्याकडे काम करणे बंद केले किंवा माझ्या मागण्या मान्य केल्या नाही, तर मी तिला ठार मारेन, असे तो म्हणाला होता. महिलेच्या मुलाने केला होता चोप देण्याचा प्रयत्न ही धमकी मिळाल्यानंतर मोलकरणीच्या मुलाने आशिष मेश्रामला गाठून चोप देण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी तो सापडला नाही. अखेर काही दिवसांनी आरोपीच्या मोठ्या भावाने मोलकरणीला आश्वासन दिले की, आरोपी आशिष आता त्या फ्लॅटमध्ये राहत नाही. या आश्वासनानंतर मृत महिलेने पुन्हा त्या फ्लॅटवर काम करण्यास सुरुवात केली. पण बुधवारी रात्री ललिता कामावर आल्याचे पाहून आरोपी पुन्हा त्या फ्लॅटवर आला. त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. पण यावेळी तिने नकार दिल्यामुळे अखेर त्याने तिची निर्घृण हत्या केली. कष्टाळू महिलेची हत्या झाल्याने संताप मृत महिला काशिमीरा भागात आपल्या पती व 4 मुलांसह राहत होती. तिचे पती चर्मकार आहेत. ती स्वतः 8-9 घरांमध्ये काम करून आपल्या संसाराला हातभार लावत होती. गत 3 वर्षांपासून मृत महिला मेश्रामकडे काम करत होती. एका कष्टाळू महिलेची अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मीरा रोड पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, सध्या त्या ट्रान्झिट रिमांडवर शहरात आणण्यात येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 12:45 pm

खरात प्रकरणी दत्तात्रय भरणेंचा सूर बदलला:म्हणाले - त्या भोंदूबाबाला तर ठोकूनच काढले पाहिजे, भोंदूगिरी खपवून घेणार नाही

नाशिकचा विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. सुरुवातीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची ठामपणे पाठराखण करणारे राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांचा सूर आता पूर्णपणे बदलला आहे. अशोक खरात हा भोंदू असून त्याला ठोकून काढले पाहिजे, अशा कडक शब्दांत भरणे यांनी आता आपली भूमिका मांडली आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आले, तेव्हा दत्तात्रय भरणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने कोणाची तरी भेट झाली किंवा फोटो काढला, तर त्यात चाकणकरांची काय चूक? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आपण कोणाला तरी गुरू मानतो, यात काहीही गैर नाही, असे म्हणत त्यांनी चाकणकरांचा बचाव केला होता. तेव्हा खरातबद्दल माहिती नव्हती मात्र, आता या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता भरणे यांनी आपली भूमिका बदलली आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जेव्हा मी आधी बोललो होतो, तेव्हा मला अशोक खरात याच्याबद्दल सविस्तर माहिती नव्हती. हे प्रकरण नेमके काय आहे, याची कल्पना नव्हती. पण आता सत्य समोर आल्यावर समजले की तो एक भोंदूबाबा आहे. अशा लोकांना वेगळ्या प्रकारे अद्दल घडवली पाहिजे. अशांमुळे सर्वांची बदनामी होते दत्तात्रय भरणे म्हणाले की, महाराष्ट्रात चांगले महाराजही आहेत, पण अशा एक-दोन लोकांमुळे सर्वांची बदनामी होते. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, अशी कबुलीही त्यांनी दिली. खरात हा अत्यंत चुकीचा माणूस असून मी त्याची पाठराखण कधीच करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 12:41 pm

रशियन ऑईल टर्मिनल्सवर भीषण हल्ला; युक्रेनचा पुतिन यांना मोठा दणका!

मॉस्को : वृत्तसंस्था गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाने आता भीषण रूप धारण केले आहे. युक्रेनने बुधवारी रशियाच्या बाल्टिक समुद्रातील ‘प्रिमोर्स्क’ आणि ’उस्त-लुगा; या दोन अत्यंत महत्त्वाच्या तेल निर्यात बंदरांवर ड्रोनचा मोठा हल्ला केला. या हल्ल्यामुळे बंदरातील तेल साठ्यांनी पेट घेतला असून, आगीचे भीषण लोट शेजारील देश फिनलंडमधूनही स्पष्टपणे दिसत आहेत. या हल्ल्यानंतर रशियाने […] The post रशियन ऑईल टर्मिनल्सवर भीषण हल्ला; युक्रेनचा पुतिन यांना मोठा दणका! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 28 Mar 2026 12:40 pm

ई-केवायसी पूर्ण न केल्यास कर्मचा-यांचे वेतन रोखणार; प्रक्रिया बंधनकारक

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सेवार्थ प्रणालीमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांची सविस्तर माहिती नोंदवलेली आहे. या माहितीच्या आधारेच वेतन अदा केले जाते. मात्र, काही प्रकरणांमध्ये एकाच कर्मचा-याची दुबार नोंद होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व कर्मचा-यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार, एप्रिल २०२६ ते मे २०२६ या कालावधीतील वेतन मिळवण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी […] The post ई-केवायसी पूर्ण न केल्यास कर्मचा-यांचे वेतन रोखणार; प्रक्रिया बंधनकारक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 28 Mar 2026 12:34 pm

वर्दीचं स्वप्न अपूर्णच!:पुणे पोलिस भरतीत 1600 मीटर धावताना बुलढाण्याच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा मैदानी चाचणी दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिवाजीनगर मैदानावर शनिवारी (दि. 28) सकाळी घडली. सोळाशे मीटर धावण्याची चाचणी देत असताना तिसऱ्या फेरीत त्याला अचानक 'फिट' आली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पुरुषोत्तम बारकुल (23, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे शहर पोलिसांच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. शनिवारी सकाळी पुरुषोत्तम याची मैदानी चाचणी सुरू होती. पोलिस भरतीतील अत्यंत कठीण टप्पा मानल्या जाणाऱ्या 1600 मीटर धावण्याच्या चाचणीत तो सहभागी झाला होता. दोन फेऱ्या पूर्ण केल्यानंतर, तिसऱ्या फेरीदरम्यान पुरुषोत्तमला अचानक 'फिट' (झटका) आली आणि तो धावता धावता मैदानावरच कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मैदानावरील इतर उमेदवार आणि पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली. पुरुषोत्तम कोसळल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली. त्यावेळी त्याचे हृदयाचे ठोके अत्यंत मंदावले असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून ससून सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. अचानक तरुणाचा भरती दरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. पुरुषोत्तमच्या निधनामुळे बुलढाणा जिल्ह्यातील त्याच्या गावावर शोककळा पसरली असून, पोलिस दलातही या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 12:14 pm

सोलापुरात कॅनमध्ये डिझेलवर निर्बंध; उद्योगांना फटका:पाच हजार रोजगार धोक्यात, वीज गेल्यावर जनसेट चालू करणे झाले मुश्कील

व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठा अद्याप सुरळित झालेला नसतानाच जिल्हा प्रशासनाने डिझेलवर निर्बंध आणले. डब्यातून डिझेल विक्रीवर बंदी घातल्याने उद्योगातील जनसेट बंद आहेत. त्याचा मोठा परिणाम उत्पादनावर झाला आणि सुमारे 5 हजार कामगार घरी बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उद्योगांत विद्युतपुरवठा खंडित झाल्यानंतर विजेला पर्याय म्हणून जनसेट चालवतात. त्याला मोठ्या प्रमाणात डिझेल लागते. तेच मिळत नसल्याने 8 उद्योगातील उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याचे उद्योग जगतातून सांगण्यात आले. एमआयडीसीमधील मोठ्या यंत्रसामग्रीला अखंडित वीज लागते. महावितरणचा पुरवठा खंडित झाल्यास लाखो रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी तत्काळ ‘पॉवर जनरेटर’ सुरू करावे लागते. त्यासाठी बॅरल किंवा कॅनमधून पंपावरून डिझेल आणले जाते. प्रशासनाने सुट्या इंधन विक्रीवर बंदी घातल्याने पंपचालक उद्योजकांना डिझेल देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. पुरवठा विभागाकडे एमआयडीसीतील अनेक उद्योजकांनी बॅरलमधून डिझेल देण्याची मागणी केली आहे. सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनला पत्र दिले. कठीण काळात महावितरणने काळजी घ्यावी कठीण काळात उद्योगांना मदत करायची असेल तर महावितरणकडून विनाअडथळा विद्युत पुरवठा सुरू ठेवावा लागणार आहे. महावितरणचे सतत अडथळे असतात. खरंच सरकारला सगळ्यांना मदत करायची असेल तर त्यांनी महावितरणचा वीजपुरवठा विनाअडथळा सगळ्यांना सुरळित ठेवला पाहिजे. आता अडचणी खूप वाढल्या. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर फॅक्टरी सुरू ठेवण्यासाठी डिझेलवरील जनसेट सुरू करावे लागतात. शरदकृष्ण ठाकरे, अध्यक्ष, लक्ष्मी हायड्रोलिक्स या उद्योगांना फटका लिनित एक्सपोर्टस्, कॉनकंट्रीझ मेटल स्ट्रॅटेझिज प्रायव्हेट लिमिटेड, लक्ष्मी हायड्रोलिक प्रायव्हेट लिमिटेड, श्रीकृष्ण फार्मासिटीकल्स अर्निकेम इंडस्ट्रीज, वेस्टर्न अमोनिया इंडस्ट्रीज. औद्योगिक संकट वाढतच जाणार 8 मार्चपासून 10 हजार 800 व्यावसायिक गॅस सिलिंडरचे बुकिंगच बंद करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने आदेश काढून 50 टक्के व्यावसायिक सिलिंडर पुरवण्याची सूचना केली. परंतु त्याच्या मार्गदर्शक सूचना अद्यापही नाहीत. त्यामुळे उत्पादनांना गॅसच नाही. अशा अवस्थेत डिझेलवर निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे औद्योगिक संकट वाढतच जाणार. त्यावर तातडीने तोडगा काढण्याची आ‌वश्यकता आहे. योग्य व्यवस्थापनाच्या सूचना दिल्या आहेत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह अन्य कामांसाठी डिझेलची गरज भासते. उद्योगांसाठी ते गरजेचेच आहे. सध्या काळाबाजार रोखण्यासाठी कॅन किंवा बाटलीतून पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पण, उद्योगांसमोर डिझेलअभावी अडचणी निर्माण होऊ नयेत. यासाठी त्यांची गरज लक्षात घेऊन योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात येतील. उद्योजकांच्या समस्यांची तातडीने दखल घेतली जाईल. जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 11:32 am

राऊतांनी नार्वेकर-खरात संबंधांवर उत्तर द्यावे:पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात इंधन पुरवठा सुरळीत, राऊत महाराष्ट्रद्रोही म्हणून काम करतायत- नवनाथ बन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 140 कोटी जनतेची टीम इंडिया अतिशय सक्षम आहेत. राऊतांनी त्यांची भूमिका काय हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. कारण ते नेहमी पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेत असतात, उबाठाची टीम पाकिस्तान आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. इंधन पुरवठा सुरळीत होण्यासाठी पंतप्रधान काम करत आहेत. नवनाथ बन म्हणाले की, कालपर्यंत गॅस आणि इंधन पुरवठा नाही म्हणणारे संजय राऊत आज इराणमुळे देशात गॅस-इंधन पुरवठा सुरळीत आहे असे म्हणत आहे. काल जेव्हा अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार ही धमकी दिली तेव्हा त्यांचे डोकं ठिकाण्यावर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे सर्व गोष्टी सुरळीत सुरू आहे. भांडणे लावू नका नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी जाती-जातीमध्ये आणि धर्मा-धर्मात वाद लावण्याचे काम करू नये. राज्यातील धार्मिक स्थळांना गॅस पुरवठा करण्याकरता राज्य सरकार प्रयत्न करत आहे. कुठेही धार्मिक भेदभाव करणे महाराष्ट्र सरकारचे काम नाही. नार्वेकरांवर काय कारवाई करणार नवनाथ बन म्हणाले की, रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झालेला आहे. तर खरात प्रकरणी कसून चौकशी करण्याचे काम राज्य सरकारकडून सुरू आहे. कुणालाही सोडले जाणार नाही. मविआने शेतकऱ्यांचे पाणी भोंदूला दिले, तेव्हा मंत्रालयापर्यंत त्याचा वावर कोणी आणला होता. राऊतांच्या दबावामुळेच खरातला पाणी देण्यात आले ही माहिती आमच्याकडे आहे. 40 आमदार खरातकडे जात होते त्यामध्ये मिलींद नार्वेकर होते, त्यांचे फोटो आहेत. नार्वेकरांवर कुठली कारवाई करणार हे स्पष्ट करा. राऊत महाराष्ट्र द्रोही म्हणून काम करता नवनाथ बन म्हणाले की, देवाभाऊंच्या नेतृत्वात टीम महाराष्ट्र अत्यंत सक्षमपणे काम करत आहे. महायुतीच्या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा गाडा अत्यंत व्यवस्थित ठेवण्याचे काम फडणवीस करत आहेत. राऊत 11 कोटी जनता आमच्यासोबत आहे. जनतेने तुम्हाला विरोधी पक्षनेता निवडून यावा इतकेही बहुमत दिलेले नाही. महाराष्ट्र विरोधी भूमिका घेताना जनतेने तुम्हाला बघितले आहे. देवेंद्र फडणवीस यांची टीम महाराष्ट्र ठरले आहे. तुम्ही महाराष्ट्र द्रोही म्हणून काम करत आहात.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 11:24 am

५ घरफोड्या करणारा बांगलादेशी आरोपी जेरबंद:पुणे पोलिसांनी विविध राज्यांतील गुन्हे उघडकीस आणले

पुणे पोलिसांनी विविध राज्यांमध्ये ५० हून अधिक घरफोड्या करणाऱ्या एका कुख्यात बांगलादेशी आरोपीला अटक केली आहे. कर्वेनगर परिसरात घडलेल्या एका घरफोडी प्रकरणाचा तपास करत असताना ही कारवाई करण्यात आली. या अटकेमुळे अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. १४ मार्च २०२६ रोजी रात्री ते १५ मार्च २०२६ दरम्यान कर्वेनगरमधील नवसह्याद्री सोसायटीतील एका कार्यालयात घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्याने खिडकीचे गज तोडून प्रवेश करत सोनी कंपनीचा कॅमेरा, दोन लेन्स, मार्विक प्रो 2 ड्रोन, अॅपल कंपनीचा आयफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असा सुमारे ६.७१ लाख रुपयांचा ऐवज चोरला होता. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक संशयित व्यक्ती रॉयल एनफिल्ड हिमालयन बाईकवरून जाताना दिसला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी त्या बाईकचा माग काढला. आरोपी हैदराबाद, नागपूर, जबलपूर, मिर्झापूरमार्गे वाराणसीकडे गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. पुणे पोलिसांनी वाराणसी पोलीस आयुक्तालयाच्या मदतीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने स्वतःचे नाव मोहम्मद बशर नूर मोहम्मद (वय ३८, मूळ रा. ढाका, बांगलादेश) असे सांगितले. तो नेवानाथ विनोद कुमार या नावानेही वावरत असल्याचे समोर आले आहे. आरोपी बनावट ओळखपत्रे तयार करून विविध ठिकाणी गुन्हे करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. आरोपीकडून चोरीस गेलेला सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय, त्याच्याकडून बांगलादेशी पासपोर्ट तसेच विविध देशांची चलनेही मिळाली आहेत. आरोपीविरुद्ध वाराणसी येथे इमिग्रेशन अ‍ॅक्ट अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये त्याच्यावर ३६ गुन्हे नोंद आहेत, तर इतर राज्यांतील गुन्ह्यांचीही चौकशी सुरू आहे. ही यशस्वी कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अलंकार पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 11:12 am

खरातसारख्या माणसाला कोणी पोसलं?:16 वर्षांपासून भोंदूकडून महिलांच्या शोषणाचे प्रकार, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार- सुषमा अंधारे

खरात प्रकरणी आर्थिक गोष्टीचा तपास करण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. चाकणकर यांचा आयोगाचा आणि प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा एकाच वेळी होऊ शकला असता. आयोगाच्या राजीनामा हा मुख्यमंत्र्यांनी द्यायला सांगितला त्यामध्ये काही तटकरेंचा रोल नव्हता. आणि महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा काही राजीनामा नाही ही गच्छंती आहे,असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांनी राजीनामा घेतला आहे, ते पक्षातील नाराजी ओळखत घेतला आहे. चाकणकर यांच्यावर आरोपपत्र दाखल होईल असे वाटते. एसआयटीवर विश्वास ठेवायला हवा. चाकणकर, केसरकरांची चौकशी व्हावी सुषमा अंधारे म्हणाल्या की, भोंदू खरात प्रकरणी पोलिस तपास करतील त्या तपासाकडे आमचे लक्ष राहील. रुपाली चाकणकर, दीपक केसरकर यांची या प्रकरणी का चौकशी व्हावी याबद्दल माहिती आम्ही एसआयटी प्रमुखांना दिली आहे. चाकणकर यांचा राजीनामा ही आमची मागणी नाहीच. त्यांना पदावर असताना अटक झाली तर पक्षाची प्रतिमा डागाळेल. त्यांच्या राजीनाम्यासाठी मी नाही तर त्यांच्या पक्षातीलच लोकं आग्रही होते. 16 वर्षांपासून महिलांचे शोषण सुषमा अंधारे म्हणाल्या की, भोंदू खरातकडून 16 वर्षांपासून महिलांचे शोषण सुरू आहे. यात किती केसेस असतील? हजारो केसेस या प्रकरणी असू शकतात. चाकणकर आणि खरात याचा 12 ते 13 वर्षांपासून संपर्क आहे. खरातला मोठे करणारी लोकं कोण आहेत, तर दीपक केसरकर यांचा मी उल्लेख केला ते शालेय शिक्षणमंत्री? ते एमआयडीसीच्या मैदानावर काय करत होते. आवारे नावाचा माणूस जो जगदंब पतसंस्थेचा प्रमुख आहे त्या पतसंस्थेमध्ये खरातचे आर्थिक व्यवहार असू शकतो त्या आवारेंची चौकशी झाली पाहिजे. खरातसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 11:05 am

हिंगोलीत पोलिस शिपाई पदाकरीता 29 मार्चला 411 उमेदवारांची लेखी परीक्षा:स्मार्ट उपकरणे आणणाऱ्यांवर कारवाई होणार, पोलिस अधीक्षक निलाभ रोहन

हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या 64 पदासाठी पात्र ठरलेल्या 411 उमेदवारांची रविवारी ता. 29 लेखी परीक्षा आदर्श महाविद्यालयात घेतली जाणार आहे. यावेळी उमेदवारांनी कुठल्याही प्रकारची स्मार्ट उपकरणे आणू नये, तसेच गैरप्रकाराचा प्रयत्न केल्यास तातडीने कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी दिली आहे. जिल्हा पोलिस दलातील 64 रिक्त पदांसाठी 11 फेब्रुवारी पासून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सदर प्रक्रियेत कागदपत्रे पडताळणी, मैदानी चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी पहाटे चार वाजल्यापासूनच भरती प्रक्रिया सुरु केली होती. त्यामुळे मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मैदानी चाचणी नंतर लेखी परिक्षेसाठी 411 उमेदवार पात्र ठरले आहे. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी ता. 29 सकाळी आकरा ते दुपारी साडेबारा यावेळेत होणार आहे. यासाठी उमेदवारांना सकाळी 9 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे सूचना दिल्या आहेत. उमेदवारांनी प्रवेश पत्रावर दिलेल्या सूचनांचे अवलोकन करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी स्मार्ट डिव्हाईस यामध्ये इलेक्टॅनिक साहित्य, वॉच, हेडफोन, मोबाईल इतर प्रतिबंधीत साहित्या परीक्षा केंद्रावर आणू नये. या ठिकाणी परीक्षा केंद्रावर आलेल्या उमेदवारांची बायोमेट्रीक तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रात सोडले जाणार आहे. आदर्श महाविद्यालयाच्या 10 खोल्यांमध्ये परीक्षा होणार असून प्रत्येक खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या शिवाय प्रत्येक खोलीत लेखी परिक्षेचे छायाचित्रीकरण केले जाणार आहे. या शिवाय चार कर्मचारी पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्येक खोलीमध्ये घड्याळ लावण्यात आले असून त्यामुळे उमेदवारांनी घड्याळ घेऊन येऊ नये. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळून आल्यास उमेदवारावर कारवाई करून परिक्षेसाठी अपात्र केले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 10:40 am

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात:नादुरुस्त ट्रकला भरधाव ट्रकची जोरदार धडक, चालक जागीच ठार, मदत यंत्रणेच्या विलंबावर प्रश्नचिन्ह

वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर कारंजा ते वनोजा टोल प्लाझा दरम्यान चॅनल क्रमांक 197 जवळ पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षा आणि आपत्कालीन मदत यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून मुंबईकडे मालवाहतूक करणारा एक ट्रक प्रवास करत असताना अचानक त्याचा डिझेल पाईप तुटला. त्यामुळे संबंधित ट्रक महामार्गाच्या मधोमधच नादुरुस्त अवस्थेत उभा राहिला. या परिस्थितीत ट्रक चालकाने तत्काळ समृद्धी महामार्गावरील मदत यंत्रणा तसेच वाहतूक पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार फोन करूनही कोणतीही मदत वेळेत उपलब्ध झाली नाही, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, नादुरुस्त ट्रक रस्त्याच्या मधोमध उभाच असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. याच दरम्यान पहाटे अंदाजे तीन वाजण्याच्या सुमारास मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने नादुरुस्त ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुसऱ्या ट्रकचा चालक जागीच ठार झाला. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक दीड ते दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे, अपघात घडूनही बराच वेळ कोणतीही मदत घटनास्थळी पोहोचली नाही. अखेर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मदत यंत्रणा आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत अपघातातील मृत व्यक्तीसाठी खूप उशीर झाला होता. या संपूर्ण घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन सेवांची तत्परता, गस्त व्यवस्था तसेच नादुरुस्त वाहनांसाठी तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या यंत्रणेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. महामार्गावर इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक असताना, अशा प्रकारे मदत मिळण्यात झालेला विलंब भविष्यात अधिक मोठ्या दुर्घटनांना कारणीभूत ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 10:37 am

कोकाटेंचे मंत्रिपद कापण्यासाठी खरातचा तटकरेंना फोन:शरद पवार गटाचा दावा; चाकणकर अन् तटकरेंना सहआरोपी करण्याची मागणी

राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्री करू नये म्हणून भोंदू अशोक खरातने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना फोन केला होता, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला होता. या प्रकरणी त्यांनी कोकाटेंना त्यांच्याकडे असलेली माहिती पुढे आणण्याचेही आवाहन केले आहे. प्रस्तुत प्रकरणात सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करून त्यांचे व्यवहार तपासले पाहिजेत. कारण अशोक खरात एकटा नसून, त्याची एक मोठी टीम आहे, असेही शरद पवार गटाने म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता तथा संघटक सचिव विकास लवांडे या प्रकरणी म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. त्याची नवनवीन प्रकरणे बाहेर येत आहेत. हा लिंगपिसाट भोंदू बाबाने गेल्या काही वर्षांत अनेक महिलांचे शोषण केले. अनेक महिलांचे शारीरिक, मानसिक आर्थिक शोषण केले. या प्रकरणात अनेक मोठे राजकीय व्यक्ती व उद्योजक अडकलेत. ही सर्व काळी कृत्य करणे हे त्याचे एकट्याचे काम नाही. त्याच्याभोवती मोठे रॅकेट किंवा मोठी टीम असल्याशिवाय हे शक्य नाही. कारण, आजपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकला नाही. त्याची कुकर्मे बाहेर आली नाही. चाकणकरांनी उपकार केल्यासारखा राजीनामा दिला विकास लवांडे म्हणाले, अशोक खरातच्या टीममध्ये ज्यांनी आता राज्य महिला आयोगाचा व राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्या रुपाली चाकणकरांचा समावेश आहे. त्यांनी उपकार केल्यासारखे राजीनामे दिलेत. त्या त्याच्यात खरोखर आरोपी आहेत. सुनील तटकरे आरोपी आहेत. हे दोघेही नाशिकच्या विमानतळावर उतरून तेथून गाडीने अनेकवेळा खरातकडे गेले आहेत. अनेक लोकांना त्यांच्या माध्यमातून अशोक खरात भेटला आहे. अशोक खरातचे अनेक व्यवहार या दोघांना माहिती आहेत. त्यामुळे या प्रकरणी खरात, तटकरे व चाकणकरांचे गत काही वर्षांतील सर्व सीडीआर तपासण्याची गरज आहे. त्यांचे मेसेज तपासले पाहिजेत. यांचा संपर्क कुठे, कसा, काय होत होता? व्यवहार कोणकोणते होत होते? हे तपासले पाहिजे. कारण, त्या ट्रस्टच्या विश्वस्तांची अद्याप चौकशी झाली नाही. त्यांच्यावर अद्याप गुन्हे दाखल झाले नाही. या ट्रस्टवर रुपाली चाकणकर स्वतः विश्वास्त होत्या. या ट्रस्टचे जे कुणी अकाउंटचे काम पाहणाऱ्या सीएवरही गुन्हा दाखल करून चौकशी झाली पाहिजे. कारण, मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत, असे ते म्हणाले. माणिकराव कोकाटेंचा होता अडथळा विकास लवांडे पुढे म्हणाले, या सर्व प्रकरणात सिन्नरचे आमदार माणिकरावर कोकाटे खरातच्या मार्गात अडथळा ठरत होते. कोकाटे या खरातकडे गेल्याचे कुठेही फोटो नाहीत, कुठेही चर्चा नाही. याच खरातने राज्यात सरकार स्थापन होत असताना सुनील तटकरेंना फोन करून कोकाटेंना मंत्री करू नये म्हणून फोन केला होता. तटकरेंनी सांगावे की किती वेळा खरातने त्यांना विनवण्या केल्या किंवा फोन केले माणिकरावांना मंत्री करू नये म्हणून. रुपाली चाकणकरांनीही तसा आग्रह धरला होता. पण अजित पवारांनी कोकाटेंना मंत्री केले. आज कोकाटेंनी त्यांच्या मतदारसंघात सिन्नरला एवढे मोठे रॅकेट सुरू असताना आता बोलण्याची आवश्यकता आहे. मंत्री कोकाटेंना अनेक गोष्टी माहिती विकास लवांडे म्हणाले, कोकाटेंना या प्रकरणातील अनेक गोष्टी माहिती असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात जोपर्यंत सुनील तटकरे व रुपाली चाकणकरांवर सहआरोपी करून गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत या प्रकरणातील नव्या गोष्टी बाहेर येणार नाहीत. खरे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही खरातसोबत फोटो असल्याचे समोर आले आहे. परवाच एक ऋषिकेश वैद्य नामक आणखी एक भोंदूबाबा सापडला. त्याच्यासोबतही मुख्यमंत्र्यांचे व आरएसएसच्या सर्व लोकांचे फोटो आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकरणात फडणवीस हेच कुणाला आरोपी करायचे व कुणाला करायचे नाही हे ठरवणार आहेत. आता या प्रकरणात मोठमोठे मासे दडपायचे की पुढे आणायचे हे मुख्यमंत्री ठरवणार आहेत. तटकरे व चाकणकरांवर गुन्हे दाखल केल्यानंतर अनेक नवी प्रकरणे पुढे येऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना फ्री हँड द्यावे अशी आमची मागणी आहे, असे लवांडे यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 10:34 am

खरातांकडे जाणारे 'ते' 40 आमदार कोण?:भोंदू बाबा कोणाला भेटायला दिल्लीला जायचा? विमानाची व्यवस्था कोणी केली, संजय राऊतांचा सवाल

सत्ताधारी आमदार दीपक केसरकर म्हणतात की मला एकट्यालाच का टार्गेट करता आहात, खरातकडे 40 आमदार जात होते, हे 40 आमदार कोण हे पुढे आले पाहिजे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. खरातसाठी विमानांची सोय करणारे सरकारमधील कोण लोकं होते हे जाहीर केले पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, खरात दिल्लीमध्ये जात कोणाला भेटत होत हे जर पोलिस तपासात निष्पन्न झाले असेल तर ते समोर आले पाहिजे. अशोक खरात यांचा वावर सर्वत्र होता. सरकारने त्याला राजमान्यता दिली होती. ज्यांनी त्यांना राजमान्यता दिली ती लोकं फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आजही आहेत, फडणवीसांनी त्यावर बोलावे. एखाद्या समाजाच्या मंदिरासाठी मंत्री जर वेगळी ववस्था करत असतील तर त्यावर आम्ही टीका करणार नाही. नरेंद्र मोदी यांनी जी चूक केली ती देवेंद्र फडणवीयांनी करू नये. त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनासोबत घेत यावर बैठक घ्यावी. विरोधी पक्षनेता नेमावा तरच टीम महाराष्ट्र तयार होईल. .. हे सर्व ढोंग संजय राऊत म्हणाले की, आपले पंतप्रधान कधी राष्ट्रीय विचार करतात का? मुळात त्यांच्या पक्षामधील टीम त्यांच्याकडे नाही. हम दो हमारे दो असे ते वागतात. जे सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिले नाही ते टीम इंडियाम्हणत आहे. हे सर्व ढोंग आहे. ते कधीच विरोधी पक्षाला विश्वासात घेत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच कोणत्या विषयावर चर्चा करत नाही. व्हिडिओची पडताळणी कशी करणार? संजय राऊत म्हणाले की, मंत्री झिरवाळ यांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओची पडताळणी कशी करणार. मुख्यमंत्री किरीट सोमय्यांच्या व्हिडिओची सत्यता तपासणार होते, असे ते बोलले होते. पण ती सत्यता पडताळली पाहिजे. विरोधी पक्षाबद्दल असे काही घडले असते तर सरकारने आधी फाशी मग चौकशी ही भूमिका घेतली असती. इथे फाशीचे नावच नाही, करू चौकशी सुरू आहे. ..तर विरोधकांना विश्वासात घेतले पाहिजे संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान, मुख्यमंत्री जर सांगत असतील लॉकडाऊन लागणार नाही तर ती चांगली गोष्ट आहे, तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीम इंडियामध्ये कोण आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले पाहिजे. का केवळ मोदी आणि अमित शहाच त्यामध्ये आहेत. जर महाराष्ट्रात टीम करायची असेल तर विरोधकांना विश्वासात घेतले पाहिजे. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेता नेमला पाहिजे. इराणमधील जनतेसाठी देशभरातील लोकांनी पैसे जमा करत त्यांना 500 कोटीची मदत केली आहे. सरकारने मदत केलेली नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपने काहीही केले तरीही तिथे ममता बॅनर्जीच जिंकणार असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 10:33 am

भोंदू खरात विरोधात आणखी 2 गुन्हे:दाम्पत्य संसार चांगला व्हावा म्हणून आले अन् खरातने नवऱ्याला बाहेर बसवून महिलेवर रेप केला

महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलिसांची हवा खाणाऱ्या भोंदू अशोक खरातवर शुक्रवारी रात्री उशिरा आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. यापैकी एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा, तर दुसरा आर्थिक फसवणुकीचा आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात खरातने पीडित महिलेवर आपल्या मोडस ऑपरेंडीनुसार म्हणजे आपण दैवी अवतार असल्याचे सांगत अत्याचार केला. ही महिला आपल्या नवऱ्यासोबत संसार सुखाचा व्हावा म्हणून खरातकडे आली होती. पण त्याने तिच्यावरच अत्याचार करून आपला कामवासना भागवली. यासंबंधीच्या माहितीनुसार, प्रस्तुत प्रकरणात पती व पत्नीचे 2013 साली लग्न झाले. पण त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते. त्यामुळे ते विभक्त राहत होते. एका व्यक्तीच्या सूचनेनुसार ते आपला संसारगाडा रुळावर आणण्यासाठी भोंदू अशोक खरातकडे गेले होते. 2022 साली हे दोघे पहिल्यांदा त्याच्याकडे गेले. त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा ते अशोक खरात याच्याकडे गेले. त्यावेळी खरातने पतीला केबिनबाहेर बसवले. त्यानंर पत्नीला तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायला देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच यावेळी त्याने तिला ठार मारण्याचीही धमकी दिली. पीडितेला काय म्हणाला होता अशोक खरात? तू ही गोष्ट कुणाला सांगितली तर मी महादेवाचा अवतार आहे. माझ्याकडे दैवी शक्ती आहे. मी तुझ्या मुलांना मारून टाकून तुझा संसार उद्ध्वस्त करेन असे खरात म्हणाला होता, असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. तत्पूर्वी, हे दोघे 2022 मध्ये पहिल्यांदा अशोक खरातकडे गेले होते, तेव्हा त्याने या दोघांना त्यांच्या लग्नाची तारीख विचारली होती. त्यांनी लग्नाची तारीख सांगितल्यानंतर तुमचे लग्न चुकीच्या तारखेला झाल्यामुळे तुमच्यात सातत्याने वाद झाल्याची बतावणी त्याने केली होती. त्यानंतर हे दोघे जवळपास 6-7 वेळा त्याच्याकडे गेले होते. ऑगस्ट 2024 मध्ये अशोक खरातच्या नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात गेले असता त्याने महिलेवर बलात्कार केला. महिलेने आपल्या तक्रारीत ऑगस्ट 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत या कालावधीत अशोक खरातने आपल्यावर 4 वेळा बळजबरीने गैरकृत्य केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अशोक खरातविरोधात आतापर्यंत सरकारवाडा पोलिस ठाण्यात एकूण 10 गुन्हे दाखल झालेत. त्यातील 2 आर्थिक फसवणुकीचे तर 8 महिला अत्याचाराचे आहेत. राजेंद्र जासूद व राजेंद्र भागवत यांनी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल केलेत. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणी नव्याने 65 जणांवर गुन्हे दाखल केलेत. यामुळे या प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईचा आकडा 74 वर गेला आहे. यापूर्वी कोपरगावातील 3, तर नाशिक पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केला होता. आता व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अवघ्या 3 दिवसांत 74 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 10:08 am

युद्धाचा मालवाहतूक व्यवसायाला फटका; ट्रकभाड्यात 20% वाढ:शहरातून बाहेरच्या राज्यांमध्ये धान्य, किराणा, औद्याेगिक उत्पादने घेऊन जाणाऱ्या 30% वाहनांना लागला ब्रेक

इराण-इस्त्रायल युध्दाची झळ वाहतूक व्यवसायालाही बसली असून अस्थिर वातावरणामुळे भाडेही 20 टक्क्यांनी वाढले आहे. मालवाहतुकीला परराज्यात जातांना जागोजागी डिझेल मिळाले किंवा हॉटेल्स खुले राहतील की नाही याची शाश्वती नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. शहरांतर्गत मालवाहतुकीवर अद्याप परिणाम दिसत नसला तरी शहरातून जाणारा कृषी माल, उद्योगांची उत्पादने, शहरात येणारे धान्य, किराणा यांवर याचा परीणाम झाला आहे. नाशिकमध्येच दररोज किमान 1150 ट्रक, ट्रेलर माल घेऊन येतात आणि तितकेच बाहेरच्या राज्यात माल पोहोचवतात, त्यापैकी 30 टक्के वाहनांना ब्रेक लागला आहे. मालवाहतूक व्यवसायाला देशाच्या धमण्या मानल्या जातात. मात्र गेल्या पाच दिवसांपासून देशभरात इंधनासाठी लागलेल्या रांगांमूळे रस्त्यात डिझेल मिळेलच याची शाश्वती राहिलेली नाही. दुसरी बाब म्हणजे, व्यवसायिक सिलिंडरअभावी अनेक हॉटेल्स बंद पडले आहेत, त्यामुळे जेवण मिळेलच याचीही शाश्वती वाहनचालकांना राहिलेली नाही. अनेक वाहनचालक वाहन रस्त्याच्या कडेला लावून आपला स्वयंपाक बनवतात, त्याकरीता प्रवासात कुठेही घेवून जाता येणारे तीन लिटरचे सिलिंडर वापरले जाते. ते यापूर्वी कुठेही भरून मिळत होते किंवा बदलून मिळत होते. आता तेही मिळणे बंद झाले आहे. या सर्व अनिश्चिततेमुळे वाहनचालक एकतर मालवाहतुकीला जाण्यास तयार नाहीत किंवा जास्तीचे पैसे मागतात. यामुळे मालवाहतुकीचे भाडेही 20 टक्क्यांनी महागले असून किमान 30 टक्के वाहनांना ब्रेक लागला आहे. शहरातून बाहेर जाणारा माल नेण्यासाठी काही प्रमाणात ब्रेक लागला आहे तसेच बाहेरील राज्यातून शहरात येणार मालही मोठ्या प्रमाणात बंद झाला आहे. यामुळे अशीच स्थिती राहिली आणि त्यात आणखी भर पडल्यास व्यवसायाला दुहेरी फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे व्यापार व उद्योग जगतातून चिंता व्यक्त होत आहे. बाहेरून गहू, तांदूळ येण्यासाठी अडचण सध्या गव्हाचा हंगाम असून मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आपल्या शहरात गहु येत असतो तर झारखंड, छत्तीसगड येथून तांदूळ येतो. मात्र, ऐन हंगामात 60 टक्के वाहने येणे बंद झाले आहे. त्यातच 31 मार्चपर्यंत मध्य प्रदेशात बाजार समित्या बंद आहेत, याचा दुहेरी फटका धान्य व किराणा व्यवसायाला बसतो आहे. - राहुल डागा, धान्य, किराणा घाऊक व्यापारी ...तर पूर्ण व्यवस्थाच कोलमडेल सिलिंडरअभावी अनेक हॉटेल्स बंद आहेत, इंधनाची शाश्वती नाही, त्यामुळे वाहतूकदार असुरक्षित झाला आहे. दोन दिवसांपूर्वी घेतलेला भाड्याचा दर आज 20 टक्के वाढला आहे. किमान 30 टक्के मालवाहतूक ठप्प आहे. शहरांतर्गत परिणाम नसला तरी दहा दिवसात हे सगळे नियमित झाले नाही तर पुर्ण व्यवस्था कोलमडेल.-राजेंद्र फड, अध्यक्ष, नाशिक डिस्ट्रीक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 10:07 am

युद्धामुळे पामतेल, सूर्यफुलात 10 रुपयांनी वाढ:दररोज लागणाऱ्या 100 टनांपैकी केवळ 70 टनच पुरवठा

आखाती देशांतील युद्धाचा परिणाम आता छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेवर दिसू लागला आहे. यातील एक म्हणजे खाद्यतेलाच्या आयात आणि पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांत सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांची वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे वाढलेले भाव आणि जहाजांचा वाढलेला वाहतूक खर्च यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. शहराला दररोज सुमारे 100 टन खाद्यतेलाची गरज भासते. मात्र, सध्या युद्धामुळे आयात मंदावल्याने केवळ 70 टनच पुरवठा होत आहे. टंचाई वाढणार रशिया-युक्रेनमधून सूर्यफूल येते, मलेशियातून पामतेल तर अर्जेंटिना-ब्राझीलमधून सोयाबीन तेल आयात होते. मात्र सध्या युद्धामुळे खर्च वाढला आहे. -राकेश पांडे, विक्रेते. करडीचे भाव कमी झाले करडीचे नवीन पीक बाजारात आले आहे. त्यामुळे करडी तेलाचे भाव 20 रुपयांनी कमी झाले आहेत.- जगन्नाथ बसैये, विक्रेते. पंधरा दिवसांत असे बदलले भाव (प्रतिलिटर) खाद्यतेल 15 दिवसांपूर्वी आताचे भावसूर्यफूल 160 रुपये 175 - 180 रुपयेसोयाबीन 140 रुपये 150 रुपयेपामतेल 110 रुपये 120 - 140 रुपयेसरकी रिफाइंड 140 रुपये 150 रुपयेशेंगदाणे 195 रुपये 200 रुपयेकरडी 320 रुपये 300 रुपये करडी तेलाच्या दरात 20 रुपयांची घसरण स्थानिक पातळीवर मात्र ग्राहकांना दिलासा देणारी बाब समोर आली आहे. करडीचे नवीन पीक बाजारपेठेत दाखल झाल्यामुळे करडी तेलाच्या दरात 20 रुपयांची घट झाली आहे. सध्या 300 रुपये लिटरने मिळणारे हे तेल आगामी काळात 250 रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 9:45 am

रोहिणी, ठोंबरे, दमानियांचा चाकणकरांवर घणाघात:'वैयक्तिक' कारणांपासून सुरू झालेला 'माज' 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे तथा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरातशी कथित संबंध असल्याच्या मुद्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. कर्माची फळे चुकत नसतात. ती ह्याच जन्मात भोगावी लागतात. 'वैयक्तिक' कारणांपासून सुरू झालेला 'माज' 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला, असे त्यांनी म्हटले आहे. रुपाली चाकणकर यांनी भोंदू अशोक खरातशी असलेल्या कथित संबंधांवरून शुक्रवारी रात्री राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यामुळे त्यांच्यावरील टीकेची धार कमी होण्याची शक्यता होती. पण उलट विरोधकांनी त्यांच्यावरील टीकेची धार अधिकच तिखट केली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. 'वैयक्तिक' कारणांपासून सूरू झालेला 'माज' 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला, असे त्यांनी म्हटले आहे. दादांच्या कार्यकर्त्या बहिणी समाधानी झाल्या - रुपाली ठोंबरे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही या प्रकरणी चाकणकरांवर निशाणा साधला आहे. चाकणकरांनी राजीनामा दिला नाही घेतला गेला आहे. भोंदूबाबा खरात बलात्कार प्रकरणात त्या आरोपी असल्याने सगळी चौकशी होणार. SIT ला मर्यादा होत्या आता त्या संपल्या. धन्यवाद सुनेत्रा वहिनी. ज्या सर्व लोकांनी ह्या पदाचा दुरुपयोग केला ते सर्व आरोपी आहेत. आज अजितदादांच्या कार्यकर्त्या बहिणी समाधानी झाल्या आहेत, असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. अंजली दमानियांनीही साधला निशाणा दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणी रुपाली चाकणकर यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या, एक ओळीचा राजीनामा. सुनेत्रा पवार मनात म्हणत असतील “मी तर वाटच पाहत होते”. हा राजीनामा समर्पित डॉ. संपदा मुंडेंना, ज्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा प्रयत्न ह्यांनी केला. त्या प्रत्येक महिलेला ज्यांच्या वेदनांना न्याय मिळाला नाही. त्यांनाही ज्यांची प्रकरणे दाबली गेली. कर्माचे फळ चुकत नाही. ह्याच जन्मात भोगावं लागतं. राजीनामा देताना काय म्हणाल्या रुपाली चाकणकर? उल्लेखनीय बाब म्हणजे रुपाली चाकणकरांनी शुक्रवारी रात्री आपल्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना उद्देशून लिहिलेल्या राजीनाम्यात त्यांनी केवळ 'मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. त्याचा आपण स्वीकार करावा', अशी दोन वाक्य लिहिली आहेत. या राजीनाम्यासोबतच्या पोस्टमध्ये त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या, खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 28 Mar 2026 9:39 am