SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
...

‘प्री-वेडिंग’ टाळा आणि लग्नाच्या जेवणात 50 पदार्थ नकोत:श्री मैड क्षत्रिय सोनार समाजाचे क्रांतिकारी ठराव, दु:खद प्रसंगही साधे असावेत‎

बदलत्या काळातील उधळपट्टीला लगाम लावण्यासाठी श्री मैड क्षत्रिय सोनार समाज महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नगर येथे संपन्न झालेल्या प्रदेश पदाधिकारी बैठकीत, लग्नसमारंभातील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी ‘प्री-वेडिंग फोटोशूट’वर बंदी आणि जेवणातील पदार्थांच्या संख्येवर मर्यादा घालण्याचे ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आले आहेत. पुणे येथे सात वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित कार्यकारिणीची ही पहिलीच महत्त्वाची बैठक नगरमध्ये पार पडली. यावेळी उर्वरित पान ४ अनावश्यक खर्च टाळावा या बैठकीत लग्नाशी संबंधित दोन मुख्य विषयांवर चर्चा झाली. सध्याच्या काळात वाढत असलेले ‘प्री-वेडिंग फोटोशूट’ टाळावे, असे आवाहन समाजातर्फे करण्यात आले आहे. तसेच, लग्नामध्ये प्रतिष्ठेपायी अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी ५० हून अधिक पदार्थ करण्याऐवजी कमीत कमी आणि मोजकेच पदार्थ करावेत, असा ठराव झाला. समाजाचा विकास होईल ^ समाजातील आर्थिक विषमतेची दरी कमी करणे ही काळाची गरज आहे. बहुतांश लग्नसमारंभात वारेमाप खर्च केला जातो. परिस्थिती नसलेल्यांना त्यासाठी कर्ज काढण्याची वेळ येते. त्यामुळे लग्नातील दिखावा कमी करून आपण जर त्या पैशातून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावला, तर समाजाचा खरा विकास होईल. - गोपालजी वर्मा, अध्यक्ष, युवा मंच

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:29 am

आठवड येथील यात्रा उत्सवात हजारो भाविकांची गर्दी:धार्मिक अन् सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, ग्रामदैवताच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा‎

तालुक्यातील आठवड येथील ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ७ एप्रिल रोजी पहाटे गावातील तरुणांनी पैठण येथून कावडीने पायी आणलेल्या जलाने म्हसोबा महाराज मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. कावड यात्रेची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महापूजा करण्यात आली. भाविकांनी देवदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रात्री ८ वाजता म्हसोबा महाराज पालखी छबीना मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रात्री ११ वाजता लोकनाट्याचा कार्यक्रम झाला. ८ एप्रिलला १० ते १२ या वेळेत कलाकारांची हजेरी कार्यक्रम झाला. त्यानंतर भाविकांसाठी वांगे-भाकरीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. दुपारी ३ ते ६ या वेळेत कुस्त्यांचा जंगी हगामा आयोजित करण्यात आला होता. यात अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील नामवंत कुस्तीपटूंनी हजेरी लावली. पंच म्हणून अतुल लगड, अशोक चोभे, बापूसाहेब गुंजाळ, भगवान लगड, बाळासाहेब लोखंडे, विष्णू घाणमोडे यांनी काम पाहिले. विजेत्या मल्लांना बक्षीसे वाटप नियोजन उपसरपंच शंकर मोरे, माजी उपसरपंच तुकाराम दाताळ, बापूराव चोभे, अक्षय लगड यांनी पार पाडले. रात्री ९ वाजता होम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्‌घाटन मागील वर्षीच्या होम मिनिस्टर कार्यक्रमात प्रथम क्रमांक प्राप्त प्रिती मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील महिला आणि यात्रेसाठी उपस्थित पाहुण्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील काही दात्यांनी या कार्यक्रमात विजेत्यांना दिलेल्या गृहोपयोगी वस्तू बक्षिसाचे प्रायोजकत्व करून सहकार्य केले. होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे नियोजन माजी उपसरपंच बी. एस. लगड यांनी केले. यावर्षी या कार्यक्रमात आश्लेषा कोरडे यांनी विजेतेपद पटकवले. यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी यात्रा कमेटीने परिश्रम घेताले. दोन्ही दिवस यात्रा शांततेत पार पडावी यासाठी नगर तालुका पोलिस ठाण्याचे चिचोंडी पाटील बीटचे पोलिस हवालदार शैलेश सरोदे आणि पोलिस हवालदार महेश भवर यांना बंदोबस्त ठेवला. यावेळी नगर जिल्ह्यातील भाविकांनीही ग्रामदैवताच्या दर्शनासाठी गावात मोठी गर्दी केली होती. यात्रा उत्सवामुळे गावात नवचैतन्य उत्सवामुळे गावात नवचैतन्य आणि धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्येही वेगळाच उत्साह जाणवत होता. या यात्रा उत्सवासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य केले. ग्रामदैवताच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे आठवड गाव भाविकांच्या गर्दीने गजबजले होते.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:28 am

श्रीरामपूरकरांची तहान भागणार:तलावात फक्त दोन दिवस पुरेल इतकाच साठा, पाण्यासाठी ससाणेंनी भरले 3 कोटी, प्रत्यक्ष साठा होईपर्यंत पाणीपुरवठा विभागाची कसरत‎

श्रीरामनवमी आणि उरूस उत्सवाच्या काळात पाणीवापर वाढल्याने श्रीरामपूर शहरावर पाणीटंचाईचे गडद संकट निर्माण झाले होते. साठवण तलावात केवळ दोन दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पालिकेची धाकधूक वाढली होती. मात्र, नगराध्यक्ष करण ससाणे यांनी पाटबंधारे विभागाची ३ कोटींची थकबाकी भरल्याने गुरुवारी सायंकाळी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार आहे. यामुळे शहरवासीयांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणातून सुटलेले पाणी ओझरपर्यंत नदीपात्रातून आणि तिथून कालव्याद्वारे श्रीरामपूरला पोहोचते. उन्हाळ्यामुळे हे पाणी शहरात पोहोचायला किमान तीन दिवस लागतील. सुरुवातीचे गढूळ पाणी सोडून द्यावे लागत असल्याने प्रत्यक्ष साठा होईपर्यंत पाणीपुरवठा विभागाची मोठी कसरत होणार आहे. पूर्वी शेती आणि पिण्यासाठी एकत्रित आवर्तन सुटत असे. मात्र, राजकीय वजन वापरून नेत्यांनी ही आवर्तने स्वतंत्र करून घेतली. परिणामी पाण्याचा अपव्यय वाढला असून ४५ दिवसांच्या आवर्तन चक्रामुळे साठवणुकीवर ताण येत आहे. नगरपालिका दररोज सुमारे दोन कोटी लिटर पाणी पुरवठा करीत आहे.सध्या एकच साठवण तलाव वापरात असल्याने जानेवारी फेब्रुवारी पर्यंत दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. त्यानंतर सण उत्सव, यात्रा आणि उन्हाळा लक्षात घेता रोज पाणी पुरवठा केला जात होता. मिल्लतनगर तलावाचे काम सुरू असल्याने सध्या शहर एकाच तलावावर अवलंबून आहे. जोपर्यंत नवीन आवर्तनाचे पाणी तलावात पडत नाही, तोपर्यंत नागरिकांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. पाणी साठवणुकीचे गणित शहराला दररोज २ कोटी लिटर पाणी लागते, गोंधवणी येथील सिमेंट तलावात ३७५ दशलक्ष लिटर क्षमता, मिल्लतनगर येथील मातीच्या तलावाचे खोलीकरण व अस्तरीकरण सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर शहराची साठवण क्षमता १ हजार दशलक्ष लिटरवर जाईल. दोन-तीन दिवसांत श्रीरामपूर शहरात पाणी येईल ^आम्ही पदभार स्वीकारताच पाटबंधारे विभागाचे ३ कोटी रुपये भरले आहेत. सध्या पालिकेची थकबाकी केवळ २ कोटी १ लाख असून, अतिरिक्त ९९ लाख रुपये आपल्याला परत मिळणार आहेत. गुरुवारी सायंकाळी आवर्तन सुटणार असून दोन-तीन दिवसात पाणी शहरात येईल. - करण ससाणे, नगराध्यक्ष, श्रीरामपूर.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:27 am

तांदुळवाडी जि. प. शाळेत चिमुरड्यांच्या प्रतिभेला बहर:जिल्हा परिषद शाळाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचा पाया, शिक्षण विस्तार अधिकारी देवरे‎

राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थित पालक आणि ग्रामस्थांची मने जिंकली. या सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता आणि लोकसहभागाचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखित झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, राहुरी पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी इंदुमती देवरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, अशा प्रकारचे सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलेला चालना मिळते. जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक संस्था आहेत. शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवणे ही काळाची गरज आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार विनीत धसाळ यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या यशोगाथेवर प्रकाश टाकला. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेच जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता टिकून असल्याचे सांगत, त्यांनी पटसंख्या वाढीसाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. वर्षभरात विविध उपक्रमांत चमकदार कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे देऊन गौरवण्यात आले. पुणे येथील उद्योजक शंकर मोरे यांनी विद्यार्थ्यांसाठी सन्मानचिन्हे उपलब्ध करून दिल्याबद्दल, युवा उद्योजक ऋषिकेश मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीते, लावणी आणि कोळीगीतांवर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या सोहळ्याला माजी मुख्याध्यापिका वंदना कांडेकर, प्रभूजी बाचकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळासाहेब पेरणे, माजी अध्यक्ष भास्कर पेरणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सर्जेराव पेरणे, निसार सय्यद, शिवाजी खडके, स्वाती धसाळ, अश्विनी चव्हाण, विक्रम पेरणे, मच्छिंद्र चव्हाण, अशोक तोडमल, रेवन्नाथ खडके यांच्यासह मोठ्या संख्येने पालक आणि महिला उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका संगीता बेदरे आणि शिक्षक रमेश घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वी झाला. शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी यासाठी परिश्रम घेतले.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:26 am

मोलमजुरी करणाऱ्या माऊलीची लेक साक्षी जपानमध्ये धावणार:प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एशियन क्रॉस कंट्री''साठी निवड‎

जिद्द आणि चिकाटी असेल तर आभाळही ठेंगणे होते, हे पारनेर तालुक्यातील कन्येने सिद्ध करून दाखवले आहे. ६० व्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत रौप्यपदक पटकावून पारनेर महाविद्यालयाच्या साक्षी भंडारी हिने थेट जपानमध्ये होणाऱ्या 'एशियन क्रॉस कंट्री' स्पर्धेचे तिकीट निश्चित केले आहे. तालुक्यातील अळकुटी येथील मोलमजुरी करणाऱ्या आईची लेक आता आंतरराष्ट्रीय धावपट्टीवर भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे. वडील पक्षघाताने विकलांग, मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढणारी आई.धावण्यासाठी अद्ययावत बुटांची आणि आधुनिक मैदानाची सोय नाही.अश्या सर्व प्रतिकुलतेवर मात राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत यश मिळवले आहे.इच्छाशक्ती प्रबळ असली की गरिबी आणि प्रतिकूल परिस्थिती यशाच्या आड येत नाही अळकुटी सारख्या छोट्या गावातील साक्षी भंडारीने अधोरेखित केले आहे. साक्षीचे वडील अर्धांगवायूचा आजार असल्याने कुटुंबाचा संपूर्ण डोलारा तिच्या आईवर आहे. आई मोलमजुरी करून घराचा गाडा ओढते. अशा खडतर परिस्थितीत साक्षीने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सांभाळत, वडिलांची सेवा करत आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आपला धावण्याचा सराव अविरत सुरू ठेवला. साक्षीची मोठी बहीण शितल हिने शालेय जीवनात धावण्याच्या स्पर्धेत मिळविलेले यश साक्षीसाठी प्रेरणादायी ठरले. गावात सुसज्ज मैदानाची कोणतीही सुविधा नसताना साक्षीने आळकुटीच्या मोकळ्या माळरानावर सराव सुरू केला. या प्रवासात तिला प्रशिक्षक श्रीराम आवारी यांचे मार्गदर्शन लाभले.चालू शैक्षणिक वर्षात साक्षीने पारनेर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात' प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश घेतला.तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांचे प्रोत्साहन आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संजय गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या दर्जेदार क्रीडा सुविधांमुळे तिचा सराव अधिक शास्त्रीय आणि योग्य पद्धतीने होऊ लागला. याच आत्मविश्वासाच्या जोरावर महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून साक्षीने एकूण आठ स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. त्यात दोन सुवर्णपदके तर सहा रौप्यपदकांची कमाई तिने केली आहे. साक्षीची मोठी बहीण भाग्यश्री भंडारी ही पारनेर महाविद्यालयाच्या मराठी विभागाची माजी विद्यार्थिनी आहे. तिनेही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील धावण्याच्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तीन सुवर्णपदके मिळवली आहेत. बहिणींचा हाच वारसा साक्षीने समर्थपणे पुढे नेला आहे. सध्या प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेत असलेल्या साक्षीने आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा डौलाने फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तिच्या या जपानवारीसाठी संपूर्ण तालुक्यातून आणि क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पन्नासहून अधिक स्पर्धांत सहभाग साक्षीने आजपर्यंत पन्नासहून अधिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला यातील राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन तिने तीस पदकांची कमाई केली तर राष्ट्रीय स्पर्धांत सहभाग घेऊन दहा पदके प्राप्त केली आहेत.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:25 am

पारनेर बाजार समिती सभापतिपदी बेलकर:उपसभापतिपदी संदीप सालके बिनविरोध

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गंगाराम बेलकर तर उपसभापतिपदी संदिप सालके यांची बिनविरोध निवड झाली.मावळते सभापती किसनराव रासकर आणि उपसभापती किसनराव सुपेकर यांनी आपले राजीनामे दिल्याने, गुरुवारी (९ एप्रिल) पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. बाजार समितीच्या सभागृहात, सहायक निबंधक तथा अध्यासी अधिकारी विकास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत सभापती, उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.यावेळी सभापती पदासाठी गंगाराम बेलकर तर उपसभापती पदासाठी संदिप सालके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने,अध्यासी अधिकारी विकास जाधव यांनी बेलकर व सालके यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवड झाल्यानंतर खासदार लंके समर्थकांनी बाजार समितीच्या आवारात फटाके, शोभेच्या दारूची आतषबाजी केली.गुलाल उधळत जल्लोष केला. माजी सभापती बाबासाहेब तरटे, किसनराव रासकर, किसन सुपेकर, बापूसाहेब शिर्के,रा. या. औटी, विजय पवार,डॉ.आबासाहेब खोडदे, अशोक कटारिया,चंदन भळगट,मेघा रोकडे,शंकर नगरे,पद्मजा पठारे, बाबासाहेब न-हे,तुकाराम चव्हाण, सचिव सुरेश आढाव बैठकीला उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:24 am

कळसुबाई शिखरावर मूलभूत सुविधा, वनसंवर्धनासाठी उपाययोजना कराव्या:कळसुबाई मित्र मंडळाची वनमंत्री नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी‎

नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेवरील महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखरावर भाविक व पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, वन्यजीव संरक्षण व पर्यावरण संवर्धनासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कळसुबाई मित्रमंडळाने केली आहे. या संदर्भात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भागीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. वनमंत्र्यांनी या निवेदनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असे सांगितले. कळसुबाई शिखर हे धार्मिक, नैसर्गिक व पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थळ असून, दरवर्षी लाखो भाविक येथे भेट देतात. मात्र, प्लास्टिक कचरा आणि अस्वच्छतेमुळे जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कळसुबाई परिसरात नियमित कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी विशेष यंत्रणा उभारावी व प्लास्टिक वापरावर कडक निर्बंध लावावेत. भाविकांसाठी सावली शेड, स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी; तसेच सूचना फलक लावावेत. कळसुबाई, अलंग, मदन, कुलंग परिसरात वनौषधी व फळझाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करावी. कळसुबाई मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून परिसराचे सुशोभिकरण करावे. बारीगाव मार्गे असलेल्या जीर्ण लोखंडी शिड्या बदलून दुहेरी (ये-जा) व्यवस्था तातडीने उभारावी. इंदोरे गावातून माकड कड्यावरून जाणारा प्राचीन मार्ग पुन्हा सुरू करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी अनिल भोपे, कैलास कडू, प्रवीन भटाटे, महेंद्र आडोळे, विकास शेंडगे, नीलेश पवार आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 7:57 am

चापडगाव संकुलात वन अधिकाऱ्यांचा सन्मान‎:नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे गौरव; चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके‎

नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील चापडगाव निसर्ग पर्यटन संकुल येथे पार पडला. यावेळी वन संवर्धन कार्यात योगदान दिलेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणतज्ञ, लेखक आणि पर्यावरण अभ्यासक प्राचार्य डॉ. किशीर पवार, वन विभागाचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजित नेवासे, सहाय्यक वन संरक्षक हेमंत उबाळे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी नाशिक जिल्ह्यात १७० बिबट्यांना रेस्क्यू करणारे लेपर्डमन हे वन विभागाच्या सेवेतून निवृत्त झाल्या बद्दल त्यांचा सत्कार प्राचार्य किशोर पवार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वन परिक्षेत्र अधिकारी बढती मिळाल्याबद्दल अशोक काळे, शासनाचे सुवर्ण पदक जाहीर झाल्या बद्दल वन परिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी, सहाय्यक वन संरक्षक भगवान ढाकरे हे निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘पक्षी’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी डॉ. योगेश महाले आणि नगरसेविका डॉ. पूनम महाले यांचे सहकार्य लाभले. स्वागत व प्रास्ताविक प्रा. आनंद बोरा यांनी केले. या स्पर्धेत पहिली ते सातवी गटात प्रथम पारितोषिक दिव्या गीते, द्वितीय हर्षदा महाले, तृतीय सिद्धी कासार तर उत्तेजनार्थ पारितोषिक संस्कृती मुरकुटे, वैष्णवी कुरणे, आराध्या सोनवणे यांना तसेच मोठ्या गटात प्रथम पारितोषिक आरोही माने, द्वितीय तनुजा मांडलिक, तृतीय संस्कृती ठोंबरे, तर उत्तेजनार्थ पारितोषिक विभुती मुरकुटे, आदिती गुंजाळ, समृद्धी सोनवणे, प्रांजळ शेळके या विद्यार्थ्यांनी पटकावले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 7:56 am

पुणे विद्यापीठ कुलगुरूंचा राजीनामा घेण्यात यावा:इगतपुरी येथे भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन‎

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक आणि प्रशासकीय कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी तहसीलदार अभिजित बारवकर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. गेल्या दोन-तीन वर्षांपासून विद्यापीठातील कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि निकाल या महत्त्वाच्या घटकांमध्ये गंभीर त्रुटी निर्माण झाल्या असून, विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक पदांवर प्रभारी अधिकारी नेमल्यामुळे नियोजनाचा अभाव असून, सीएएस आणि पीएच.डी. संबंधित प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना महिनोन‌्महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थी हिताच्या प्रश्नांऐवजी कुलगुरू राजकारण आणि दबाव तंत्राचा वापर करत असून, सिनेट व मॅनेजमेंट कौन्सिल सदस्यांच्या कुटुंबियांची सोशल मीडियावर बदनामी होत असल्याचा प्रकारही निषेधार्ह असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. याप्रसंगी भाजपच्या जिल्हा सरचिटणीस पल्लवी शिंदे, प्रफुल्ल कुमट, अण्णासाहेब डोंगरे, अरुण शेलार, महेंद्र कुवर, दिपा रॉय, प्रतिभा काळे आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 7:49 am

शरद पवार गटाला धक्का:फुलंब्री पं. स. उपसभापतींचा भाजपत प्रवेश

तालुक्याच्या राजकारणात गुरुवारी मोठी उलथापालथ झाली. काँग्रेसच्या तिकीट वाटपावर नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पंचायत समिती निवडणूक लढवलेल्या उपसभापती अश्विनी आजिनाथ सोनवणे यांनी समर्थकांसह भाजपत प्रवेश केला. खामगाव येथे माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. खामगावला भाजपतर्फे नवनिर्वाचित पं.स. सदस्य, सभापती, उपसभापती यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या वेळी जि.प. उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, गोपाल वाघ, निखिल चव्हाण उपस्थित होते. पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोटे उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी जि.प. सदस्य गंगाधर पाटील सोनवणे यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. आता सासरे आणि सून दोघेही भाजपत गेल्याने तालुक्यात काँग्रेसला धक्का बसला. काँग्रेससमोर मोठे आव्हान तालुक्यात ५१ ग्रा.पं.च्या निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला बसलेला हा धक्का आगामी काळात तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 7:33 am

खंडाळ्यामध्ये जनता दरबार:घरकुल, शेततळ्यांच्या तक्रारी

वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील आरोग्य उपकेंद्रात गुरुवारी (दि. ९) जनता दरबार झाला. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. गाव पातळीवरील सांडपाणी व्यवस्थापन, घरकुल, शेततळे, गायगोठे, रस्ते, पाणी, वीज, विकासकामे अशा तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात, तक्रारींचे त्वरित निवारण व्हावे, या उद्देशाने दरबार घेण्यात आला. नागरिकांनी समस्या मांडल्या. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले. महावितरण विभाग, पशुवैद्यकीय विभाग, रोजगार हमी योजना यांच्याशी संबंधित तक्रारी पुढील महिन्यात होणाऱ्या जनता दरबारापर्यंत मार्गी लागणे आवश्यक असल्याचे संजय निकम यांनी सांगितले. तक्रारी मार्गी लागल्या नाहीत तर अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पंचायत समिती सदस्य हुसेन शेख, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रकाश शिंदे, विस्ताराधिकारी राठोड, विलास पवार, बाबाराव थोरात, ग्रामपंचायत अधिकारी भीमराज दाने, दस्तगीर शेख आदी उपस्थित होते.संजय निकम यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला भेट दिली. कर्मचारी, आशा सेविका यांची सविस्तर माहिती घेतली.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 7:32 am

पैठणला वाळूचा लिलाव पाटेगावला, पण उपसा होतोय अनेक ठिकाणांहून:दररोज जवळपास 1 हजार ब्रासचा अवैध उपसा, कारवाईची मागणी‎

पैठणच्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. दररोज १०० पेक्षा अधिक हायवांद्वारे सुमारे १ हजार ब्रास वाळू काढली जात असल्याची बाब समोर आली आहे. बेसुमार उपशामुळे नदीपात्राचा नैसर्गिक समतोल बिघडत असून, पर्यावरणप्रेमींनी तातडीने लगाम घालण्याची मागणी केली आहे. पाटेगाव येथे एकाच वाळूपट्याचा लिलाव झालेला आहे. इतर ठिकाणी २४ तास अवैध उपसा सुरू असल्याचे सांगितले जाते. हिरडपुरी, आपेगाव, मायगाव, नायगाव, कुरणपिंप्री, तुळजापूर, टाकळी अंबड, मुंगी येथे बेसुमार अवैध वाळू उपसा होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एकाच वाळूपट्याला अधिकृत परवानगी दिल्याचे सांगितले जाते. त्याच नावाखाली सर्वत्र उपसा सुरू झाल्याचा आरोप आहे. यामुळे दररोज सुमारे १०० वाहनांद्वारे १० हजारांहून अधिक ब्रास वाळूची वाहतूक होत असल्याचेही सांगितले जाते. हिरडपुरी, तुळजापूर, आपेगाव, कावसान येथून १०० पेक्षा अधिक जड वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात उपसा सुरू असल्याचेही नमूद केले जाते. केवळ या महिन्यांत दहा हजार ब्रास वाळू काढली गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंत्रांचा वापर वाढल्याने मजुरांवर परिणाम झाला आहे. पूर्वी हजारो नागरिकांना मिळणारा रोजगार कमी झाल्याचे सांगितले जाते. नियमांनुसार एका वाहनात २ ते ३ ब्रास वाळू असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ५ ते ७ ब्रास वाळू भरली जात असल्याचेही समोर आले आहे. अवैध वाळूवर कारवाई करू शहरासह तालुका हद्दीतील गोदावरीतून अवैध वाळूचा उपसा होत असेल तर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 7:30 am

स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रकरणांतील गुन्हेगारांवर मकोका:रुग्णालयांचे परवानेही होणार रद्द, कायद्यात सुधारणा करणार असल्याची मंत्री आबिटकरांची माहिती

राज्यात स्त्रीभ्रूणहत्यांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि अवैध गर्भपाताच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार अत्यंत कठोर पावले उचलत आहे. यापुढे अवैध गर्भपातासारखे गंभीर गुन्हे वारंवार करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध आणि रुग्णालयांविरुद्ध (‘संघटित गुन्हेगारीचे केंद्र’) म्हणून मकोका अंतर्गत कारवाई करणार आहे. या संदर्भात कायद्यात सुधारणा करणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. मराठवाडा तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अवैध गर्भपाताच्या घटना घडल्या. या प्रकरणांमध्ये आरोपी कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन सुटतात. ते पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करतात. ही बाब गंभीर असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. ही गंभीर बाब रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी अधिवेशनामध्ये सर्वपक्षीय आमदारांशी चर्चा झाली. त्यानंतर बैठकही घेण्यात आली. गुन्ह्याचे गांभीर्य आणि शिक्षेची तरतूद वाढवण्यासाठी विधी व न्याय विभागाची परवानगी आवश्यक होती. गर्भपातप्रकरणी सध्या कोणते कलम लागते? सध्या अवैध गर्भपात आणि स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणांत प्रामुख्याने पीसीपीएनडीटी कायदा (१९९४): गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व निदान तंत्र कायदा. याअंतर्गत लिंगनिदान करणे हा गुन्हा आहे. एमटीपी कायदा (१९७१): वैद्यकीय गर्भपात कायदा. यानुसार विनापरवाना किंवा चुकीच्या पद्धतीने गर्भपात केल्यास कारवाई होते. भारतीय दंड संहितेच्या कलम ३१२ ते ३१५ नुसार (गर्भवती स्त्रीचा गर्भपात करणे, जीवितास धोका निर्माण करणे) कारवाई केली जाते. पळवाट : यातील बहुतांश गुन्ह्यांमध्ये कमी शिक्षा आहे. जामिनाची तरतूद आहे. त्यामुळे आरोपी कायदेशीर पळवाटा शोधून लवकर बाहेर येतात. काय आहे मकोका? : मकोका म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ॲक्ट, १९९९). हा राज्याचा अत्यंत कडक कायदा आहे. तो मुळात संघटित गुन्हेगारी, टोळ्या, दहशतवादी कारवाया मोडून काढण्यासाठी तयार करण्यात आला आहे. संयुक्त कारवाईचे आदेश बीड आणि मराठवाड्याच्या काही भागांत अशा घटना अधिक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि आरोग्य विभागाच्या पथकाला सामूहिक सूचना दिल्या आहेत. संशयास्पद केंद्रांवर प्रत्यक्ष भेटी वाढवून कडक देखरेख ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे आबिटकर यांनी सांगितले. मकोकामुळे गर्भपात रॅकेटचा मुळासकट नायनाट होईल सोनोग्राफी करणारे, बोगस डॉक्टर, एजंट यांची मोठी संघटित साखळी कार्यरत असते. सध्याच्या कायद्यांत जामिनाच्या पळवाटा असल्याने आरोपी लवकर सुटतात. त्यामुळे याला संघटित गुन्हेगारी मानून थेट मकोका लावल्यास या गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल.- डॉ. नागनाथ कोडे (सेवानिवृत्त सहा.आयुक्त) तर नोंदणी होणार रद्द जे दवाखाने किंवा हॉस्पिटल्स वारंवार अशा प्रकारची अवैध कृत्ये करत आहेत, त्यांचे रजिस्ट्रेशन कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा रुग्णालयांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. यामध्ये कोणतीही हयगय केली जाणार नाही. अशांची नोंदणीच तत्काळ रद्दचे आदेश आहेत. पुढील अधिवेशनापर्यंत निर्णय अपेक्षित स्त्रीभ्रूणहत्येसंदर्भात दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी कायद्यात बदल करावे लागणार आहेत. यासाठी विधी व न्याय विभागाकडून माहिती मागवण्यात येईल. त्यानंतर जवळपास पुढील अधिवेशनापर्यंत या प्रकरणात ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे, परंतु तोपर्यंत काय, हा प्रश्न कायम राहतो.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 7:27 am

‘नीट’ची तयारी करणाऱ्या तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार:सलग 3 वर्षे अत्याचार करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

‘नीट’ची (वैद्यकीय प्रवेश परीक्षा) तयारी करणाऱ्या २३ वर्षांच्या तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले. हा प्रकार २०२३ ते एप्रिल २०२६ दरम्यान घडला. या प्रकरणी जयदत्त जगन्नाथ चोरगे (२४, रा. कोल्हे होड, ता. गेवराई, जि. बीड) याच्यावर बुधवारी (८ एप्रिल) जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी जालना जिल्ह्यातील असून, ती शहरात ‘नीट’ची तयारी करत आहे. जून २०२३ मध्ये तिची ओळख जयदत्तशी झाली. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले. २८ जून २०२३ रोजी मित्राच्या फ्लॅटवर नेऊन तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केला. त्यानंतर १ मार्च २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात ते शिवाजीनगर आणि बीड बायपास परिसरात ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. याच काळात जयदत्त इतर मुलींच्या संपर्कात असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तिने जाब विचारला असता, त्याने तिला मारहाण केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक वाघ करत आहेत. सोने विकून दिले पैसे जानेवारी २०२६ मध्ये जयदत्तला एम.कॉम.च्या प्रवेशासाठी पैशांची गरज होती. त्या वेळी तरुणीने सोने मोडून ८० हजार रुपये त्याला दिले. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी लग्नासंदर्भात दोन्ही कुटुंबांची शहागड येथे बैठक झाली. मात्र, जयदत्तच्या वडिलांनी लग्नास नकार दिला. तरीही जयदत्तने आपण लग्न करणारच असल्याचे खोटे आश्वासन तरुणीला दिले.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 7:17 am

‘तो खुर्चीजवळ माझ्या अंगालास्पर्श होईल असा उभा होता..’:कॉर्पोरेट जिहाद, पीडित तरुणीने सांगितली आपबिती

मला वाटलं होतं की ही मोठी, बहुराष्ट्रीय आयटी कंपनी आहे. तिथे आपल्यासाठी चांगल्या कामाचे वातावरण असेल. पण हळूहळू लक्षात आले की तिथे कामापेक्षा माझा धर्म आणि माझ्या विचारांबद्दल जास्त बोललं जातंय. माझ्या मनात माझ्याच धर्माबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात ‘जिहाद’पेरला जात असल्याचे वेळीच लक्षात आलं. एवढंच नव्हे तर तौसिफ अत्तार नावाचा प्रोसेस लीडर एकदा माझ्या अंगाला स्पर्श होईल अशा पद्धतीने माझ्या खुर्चीजवळ उभा होता. हे शब्द आहेत नाशिक येथील आयटी कंपनीत लैंगिक अत्याचार झालेल्या २५ वर्षीय तरुणीचे. तिने ‘दिव्य मराठी’ला सांगितलेली आपबिती तिच्याच शब्दांत. मी प्रोसेस असोसिएट पदावर होते. प्रोसेस लीडर तौसिफ अत्तारशी नेहमी कामानिमित्त बोलणं होत असे. दुसऱ्या विभागातील काही जणींना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी एचआर हेडकडे झाल्याचे माझ्या कानावर आलं होतं. एकदा ऑफिसच्या लॉबीमध्ये मी आणि दोन मैत्रिणी ताक पीत होतो. फोन आल्याने दोघीजणी निघून गेल्यावर दोन पाच मिनिटात तौसिफ आला. बहुतेक तो दोघी जाण्याची वाट बघत असावा. मग मी बसलेल्या खुर्चीजवळ अंगाला स्पर्श होईल असा तो उभा राहिला. माझ्याकडे वेगळ्याच नजरेने एकटक रोखून बघत होता. मी ताक पिताना त्याने ‘क्या पी रही हो’ असे विचारलं. मी त्याला ‘छांस पी रही हूं’ असे सांगितले. तेव्हा तौसिफने स्वत:च्या गुप्तांगाकडे इशारा करून ‘मेरे पास भी छांस है, तुझे चाहिये क्या’ असे विचारत अश्लील हावभाव केले.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 7:01 am

मुंबईमध्ये हिंदू यात्रेवर हल्ला करणाऱ्यांच्याअनधिकृत बांधकामावर बुलडाेझर चालला:दीड तासात 3 हजार चौ.फु.चे बांधकाम जमीनदोस्त, 11 जणांवर गुन्हा

मुंबईच्या दिंडोशीतील संतोषनगरमध्ये ३ एप्रिल रोजी देवीच्या पालखी यात्रेवर ड्रग माफिया सबू शेख, सोहेल शेख व काही जणांनी दगडफेक केली. या प्रकरणी ११ जणांना अटक केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशावरून मुंबई मनपाने ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये येत ड्रग माफियांच्या सुमारे ३ हजार चौरस फुटांच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर चालवून ते दीड तासात जमीनदोस्त केले. मुंबईत अशा प्रकारे कारवाईची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी मार्च २०२५मध्ये नागपुरात मुख्य दंगलखोर फहीम खानचे बांधकाम मनपाने पाडले होते. ३ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला दिंडोशीत देवीच्या पालखीवर दगडफेक झाली होती. त्यात भाविक व पोलिस जखमी झाले. हल्ल्याचा मुख्य सूत्रधार सबु शेख कोठडीत असून त्याच्या संपत्तीची चौकशी ईडी, अमली पदार्थ विरोधी पथकाकडूनही होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आक्रमक, उद्धवसेनेचा पाठिंबा दिंडोशी येथे उद्धवसेनेचे सुनील प्रभू आमदार आहेत. सूत्रांनुसार केरळ प्रचार दौऱ्यावरून परतल्यावर मुख्यमंत्र्यांनी दगडफेकीच्या घटनेचा आढावा घेत मनपाला कारवाईचे आदेश दिले. मुस्लिम मतांवर डोळा ठेवून कारवाईवेळी उद्धवसेनेकडून काही प्रमाणात विरोध होईल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात आमदार प्रभूंनी प्रशासनावर टीका करत कारवाईला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, मी अडीच-तीन वर्षांपासून विधानसभेत येथील ड्रग्ज विक्रीबाबत आवाज उठवत आहे. येथे कारवाईसाठी पोलिस आयुक्तांना लेखी पत्रेही दिली होती.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 6:58 am

‘आधी पैसे भरा, मगच वीज वापरा’:देशभरात स्मार्ट प्रीपेड मीटर वापर बंधनकारक होणार, मोबाइलप्रमाणे रिचार्जिंग, 1 एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू

देशातील वीज वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने ‘मीटरिंग नियमावली २०२६’ लागू केली. त्यानुसार १ एप्रिल २०२६ पासून देशभरात प्रत्येक घरात ‘स्मार्ट प्री-पेड मीटर’ बसवणे बंधनकारक केले आहे. यामुळे सर्वसामान्यांना आता मोबाइलप्रमाणे आपले वीज मीटर रिचार्ज करावे लागणार आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे सचिव राकेश कुमार यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार, मोबाईल किंवा इंटरनेटचे नेटवर्क उपलब्ध असलेल्या सर्व ठिकाणी जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर लावले जातील. महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात झाली आहे. सर्व मीटर बदलल्यानंतरच ‘प्री-पेड’ची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल. ग्राहकांवर बोजा पडू नये म्हणून याची कालबद्धता ठरविण्याचे अधिकार राज्य शासनाला देण्यात आले आहेत. पुश बटण दाबून दररोज बॅलन्स अन् युनिटस््ही तपासता येईल स्मार्ट मीटर तंत्रज्ञान कसे काम करते?हे मीटर पूर्णपणे वायरलेस असून त्यात डीटीएच प्रमाणे एक विशिष्ट सीमकार्ड असेल. ते सुरक्षित नेटवर्कद्वारे थेट राज्याच्या वीज कंपनीच्या मुख्य सर्व्हरशी जोडलेले असेल. यातून वीज वापराचा डेटा स्वयंचलितपणे कंपनीला मिळेल.रिचार्ज कसे करायचे व बॅलन्स संपल्यावर काय? ग्राहकांना व उद्योगांना काय फायदा? ग्राहकांसाठी : ‘रिमोट रीडिंग’ तंत्रज्ञानामुळे मीटर रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्याची गरज उरणार नाही. मानवी चुकांमुळे येणाऱ्या अवाजवी आणि चुकीच्या बिलांचा फटका ग्राहकांना बसणार नाही. तसेच, बंद घरांची बिले भरण्याची कटकट संपेल.उद्योगांसाठी: ६५० व्होल्टपेक्षा अधिक दाबाचा वीज पुरवठा घेणाऱ्या उद्योगांसाठी ‘मेन मीटर‘, ‘चेक मीटर’ आणि ‘स्टँडबाय मीटर’ कुठे बसवावेत, याची स्पष्ट नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मीटरिंग अचूक होऊन वाद टळतील.सरकार व वीज कंपन्यांसाठी: वीज वापराचा अचूक डेटा मिळेल आणि वीजचोरीला १०० टक्के आळा बसेल, असा सरकारचा दावा आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 6:53 am

संभाजीनगरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पेट्रोल पंपावर पत्नीची गळा चिरून हत्या:करमाडला भरदिवसा विभक्त पतीचे कृत्य, आरोपीस अटक

विभक्त राहणाऱ्या पत्नीचा पतीनेच चारित्र्याच्या संशयातून चाकूने गळा चिरून खून केल्याची अत्यंत धक्कादायक घटना करमाड शिवारातील ‘शिवसमर्थ’ पेट्रोल पंपावर घडली. गुरुवारी (९ एप्रिल) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास हा थरार घडला. पूजा गावंडे (२७, रा. चित्तेपिंपळगाव, ह. मु. करमाड) असे मृत महिलेचे नाव आहे, तर सत्यम रावसाहेब गावंडे (२८, रा. चित्तेपिंपळगाव) असे मारेकरी पतीचे नाव आहे. या घटनेनंतर कचनेर शिवारात एका शेतात लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून अवघ्या दीड तासात बेड्या ठोकल्या आहेत. पूजा गावंडे या गेल्या दीड महिन्यापासून करमाड येथील पेट्रोल पंपावर काम करत होत्या. गुरुवारी दुपारी संशयित सत्यम दुचाकीवरून पंपावर आला. स्टँडजवळ दुचाकी उभी करून त्याने अचानक पूजाचा हात पकडला आणि काही कळण्याच्या आतच तिच्या पाठीवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. पूजा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळताच नराधम सत्यमने तिचा गळा चिरला. हा संपूर्ण थरार पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. खून केल्यानंतर सत्यमने दुचाकीवरून पिंपरीराजामार्गे कचनेरच्या दिशेने पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी तातडीने माहिती मिळवत त्याचा पाठलाग केला आणि शेतात लपलेल्या सत्यमला शिताफीने अटक केली. सत्यम चाकू घेऊन माझ्यामागे धावला, जीव वाचवून पळालो मी पंपावरील केबिनमध्ये बसलो होतो. अचानक महिलेचा ओरडण्याचा आवाज आल्याने मी तातडीने बाहेर आलो. तेव्हा एक जण कर्मचारी पूजावर चाकूने सपासप वार करताना दिसला. तिला वाचवण्यासाठी धावलो. मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने चाकू उगारून माझा पाठलाग केला. मग मी लांब पळालो. आरोपीनेही दुचाकीसह पळ काढला. रेकी केली, गर्दी नसताना शांत डोक्याने हत्या पत्नीची हत्या करण्यासाठी सत्यम सकाळी पेट्रोल पंपावर आला होता. परंतु पंपावर गर्दी असल्याने त्याला संधी साधता आली नाही. दुपारी पंपावर गर्दी नसताना त्याने शांतपणे गळा चिरून पत्नीची हत्या केली. त्यानंतर कमरेला चाकू खोचून दुचाकीवरून पळ काढला.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 6:48 am

पुण्याची घटना:पोलिस निघाले खंडणीखोर; प्राचार्यांना धमकावून उकळली 7 लाखांची खंडणी, पीएसआय, रीलस्टार महिला पोलिसांसह तिघांवर गुन्हा

महाविद्यालयातील विद्यार्थिनीला धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार असल्याचे सांगून प्राचार्याला पोक्सोच्या गुन्ह्याची भीती दाखवत शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १८ जुलै ते २८ जुलै २०२५ दरम्यान घडला होता. या प्रकरणाची माहिती यातील संबंधित मुलीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन सांगितली. पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेला याचा तपास करण्यास सांगितले. त्यानंतर गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, मार्शल सोनाली हिंगे आणि पोलिस अंमलदार सुदाम तायडे अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत. हे सर्वजण शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. अजित बडे हे आता सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. दामिनी मार्शल म्हणून कार्यरत असलेल्या सोनाली हिंगे रीलस्टार म्हणून प्रसिद्ध आहे. याबाबत एका प्राचार्यांनी तक्रार दिली आहे. जुलै २०२५ मध्ये ते काम करीत असलेल्या महाविद्यालयात हे तिघे पोलिस गेले. अजित बडे याने विचारले की, तुम्ही एका मुलीची कागदपत्रे काढून ठेवली आहेत का? त्यावर प्राचार्यांनी प्रवेशाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांची सर्व कागदपत्रे आम्ही आमच्याकडे ठेवतो. त्यावर बडे याने या विद्यार्थिनीला तुम्ही मेट्रो स्टेशनवर बंदुकीचा धाक दाखवून तिला गाडीमध्ये ओढले असल्याची तुमच्या विरोधात तक्रार आली असल्याचे सांगितले. पुणे ‘दामिनी मार्शल’ पथकात सोनाली हिंगेचे सोशल मीडियावर एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ड्युटीवरील आणि डान्सच्या रील्समधून ती तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. पुण्याच्या ‘दामिनी मार्शल’ पथकात काम करते. खंडणीच्या गुन्ह्यामुळे पोलिस दलासह सोशल मीडियावरही मोठी खळबळ उडाली आहे. मुलगी म्हणाली, पोलिसांनी मला खोटा अर्ज करण्यास सांगितले याबाबत या संबंधित मुलीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन काही दिवसांपूर्वी याची माहिती दिली. आपल्याला पोलिसांनी कसा खोटा अर्ज करायला सांगितले, हे या मुलीने सांगितले. पोलिस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी याची चौकशी केली. प्राचार्यांना बोलावून मुलीचा तक्रार अर्ज दाखवला. त्या वेळी प्राचार्यांनी पोलिसांनी आपल्याकडून कसे पैसे उकळले, याची माहिती दिली. त्याची चौकशी केल्यानंतर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. त्यानुसार गुरुवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप तपास करत आहेत.दरम्यान, याआधी संशयितांनी आणखी कुणाला अशाच पद्धतीने फसवले आहे का‌‌ ? याचाही पोलिस आता कसून तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी संबंधित प्राचार्याला ‘पोक्सो’ गुन्ह्याची भीती दाखवली संबंधित विद्यार्थिनी १८ वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याने तुमच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल होईल, अशी भीती दाखवली. आपल्याला अटक होईल, संस्थेचे नाव बदनाम होईल, अशी धमकी दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी त्यांनी मुलीशी बोलून काही होतेय का हे सांगतो, त्यानंतर त्यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर बडे याने त्यांना धमकावले. शेवटी प्राचार्यांनी बदनामीच्या भीतीने ७ लाख रुपये मुलीच्या शिक्षणासाठी दिले. मात्र, त्यानंतरही हा प्रकार सुरूच राहिल्याने संबंधित प्राचार्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 6:42 am

अशोक खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार

प्रतिभा चाकणकर रुपाली चाकरणकरांच्या भगिनी कोट्यवधींचे व्यवहार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार अहिल्यानगर : प्रतिनिधी नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला एसआयटीने आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने अशोक खरातला आणखी ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे खरातचा पोलिसांच्या तावडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. खरातवर एकूण १२ गुन्हे दाखल असून एसआयटीने न्यायालयातून आज लगेचच तिस-या […] The post अशोक खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 1:15 am

शस्त्रसंधी हवेतच?

इस्रायल, अमेरिकेचे हल्ले सुरूच, होर्मुझवर इराणचे नियंत्रण विश्वासघात केल्यास सर्वनाश, ट्रम्प यांचा इराणला इशारा वॉशिंग्टन : वृत्तसंस्था इराण आणि अमेरिकेमध्ये १४ दिवसांच्या युद्धविरामाचा निर्णय झाला. या निर्णयानंतर आखातातील तणाव कमी होईल, असे वाटत होते. मात्र, इस्रायलने लेबनानवरील हल्ले सुरूच ठेवल्याने इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट करत […] The post शस्त्रसंधी हवेतच? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 1:13 am

मुकुल चौधरीची धमाकेदार खेळी, लखनौचा विजय

कोलकाता : वृत्तसंस्था मुकुल चौधरीने मोक्याच्या क्षणी जोरदार फटकेबाजी करीत शानदार अर्धशतक झळकावले आणि घरच्या मैदानावर खेळणा-या कोलकाता नाईट रायडर्सचा लखनौ सुपर जाएंटस संघाने पराभव केला. त्यामुळे अजिंक्य राहणेच्या संघाला मोठा धक्का बसला. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने ४ विकेटसच्या मोबदल्यात १८१ धावा करीत लखनौसमोर १८२ धावांचे आव्हान ठेवले होते. १८२ धावांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी लखनौचा […] The post मुकुल चौधरीची धमाकेदार खेळी, लखनौचा विजय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 1:11 am

तात्पुरता युद्धविराम?

काही तासांपूर्वी ‘आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल’ अशी भीषण धमकी देणा-या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर नरमाईची भूमिका घेतली. मध्य आशियातील वाढता तणाव पाहता, ट्रम्प यांनी इराणवर होणारी संभाव्य बॉम्बफेक किमान दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्याचे मान्य केले. मध्यस्थांनी मांडलेला १४ दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव अमेरिकेने स्वीकारल्याने जगावर ओढवलेले युद्धाचे संकट तूर्तास टळले आहे. […] The post तात्पुरता युद्धविराम? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:35 am

बाकली येथे यात्रेनिमित्त  जंगी कुस्त्या उत्साहात

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी बाकलीचे श्रीक्षेत्र हनुमान मंदीर देवस्थानच्या यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा शुभारंभ श्री क्षेत्र मारोती आश्रमचे महंत शिवरामदास गुरु नारायणदास वैरागी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संत महतांची प्रमुख उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील मल्लांच्या जंगी कुस्त्या झाल्या. तालमीतील मातीचा सुगंध, अंगावर पिळदार स्रायू, पहाटेच्या सरावाने कमावलेली अफाट ताकद, दुध-तुपावर पोसलेले शरीर आणि […] The post बाकली येथे यात्रेनिमित्त जंगी कुस्त्या उत्साहात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:33 am

केज येथील तहसीलदार कार अपघातात ठार

रेणापूर : प्रतिनिधी रेणापूर पिंपळफट्यापासून काही अंतरावर व नेहरूनगरजवळ लातूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार दि. ९ रोजी पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात केज (जि. बीड) येथील तहसीलदार राकेश अण्णासाहेब गिड्डे (वय ३१) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रशासन व परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मिरज तालुक्यातील (सांगली) बेडक […] The post केज येथील तहसीलदार कार अपघातात ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:32 am

उपाध्यक्षांसह सभापतींना आज खातेवाटप

लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषदेत चार विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रीया पार पडल्यानंतर चार पैकी दोन सभापतींना खाते वाटप झाले. तर उर्वरीत दोन सभापतींना व उपाध्यक्षांना आगामी शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक बोलवून पदभार देणे आवश्यक होते. मात्र उर्वरीत दोन्ही सभापतींनी पुढील सभेच्या १० दिवस अगोदरच आपल्या पदाचा पदाभार […] The post उपाध्यक्षांसह सभापतींना आज खातेवाटप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:31 am

विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठण्याची सुवर्णसंधी

लातूर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांसाठी पोषक शैक्षणिक वातावरण आहे. म्हणून विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठण्याची सुवर्ण संधी उपलब्ध असल्याचे मत विभागीय शिक्षण उपसंचालक दीपक चवणे यांनी व्यक्त केले. दयानंद विज्ञान महाविद्यालयास लातूर विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक दीपक रामराव चवणे यांनी पदावर रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हास्तरीय आढावा बैठकीच्या निमित्ताने भेट दिली. यावेळी महाविद्यालयात चवणे यांचा सन्मान व सत्कार […] The post विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठण्याची सुवर्णसंधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:29 am

चिंचोलीराव वाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट

लातूर : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोलीराव वाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास गुरुवारी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी भेट देऊन दर्शन घेतले, प्रार्थना केली. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते काल्याच्या कीर्तना निमित्त दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी हभप नितीन महाराज हिप्पर्गेकर, […] The post चिंचोलीराव वाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:28 am

जुन्यांचे हाल, नवीन अर्ज धूळखात 

लातूर : प्रतिनिधी ‘सब का साथ, सबका विकास’, ही देशाचे पंपप्रधान नरेंद्र मोदी यांची टॅग लाईन असली तरी येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वृद्ध, दिव्यांग व विधावांना ना साथ आहे ना विकास, असे चित्र दिसून येत आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून अनुदान रखडल्याने या लाभार्थ्यांचे हाल होत आहेत. लातूरच्या तहसील कार्यालयात या योजनेच्या […] The post जुन्यांचे हाल, नवीन अर्ज धूळखात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:27 am

पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद

लातूर : प्रतिनिधी राज्यात काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी सुरू असलेल्या ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत दि. ९ एप्रिल रोजी लातूर येथील काँग्रेस भवनमध्ये जिल्ह्यातील प्रमुख पदाधिका-यांची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तथा चंदीगड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष एच. एस. लकी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या […] The post पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:26 am

विश्व नवकार मंत्र दिनानिमित्त सामूहिक जप 

लातूर : प्रतिनिधी ९ एप्रिल हा दिवस दरवर्षी पूर्ण जगात जीतो जैन संघटनेच्या वतीने ‘विश्व नवकार मंत्र दिवस’ म्हणून श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. या निमित्ताने विविध जैन मंदिरे, जैन देहरासर तसेच जैन उपाश्रय (स्थानक) येथे नवकार मंत्राच्या सामूहिक जपाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने श्री वर्धमान श्वेतांबर जैन श्रावक संघ, लातूर यांच्या […] The post विश्व नवकार मंत्र दिनानिमित्त सामूहिक जप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:24 am

शाहू महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘शांतिपर्व’ची धमाल 

लातूर : प्रतिनिधी शिवछत्रपती शिक्षण संस्थाद्वारा संचलित येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘शांतिपर्व-२०२६’ उत्साहाच्या वातावरणात पार पडले. दोन दिवशीय या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करुन धमाल उडवून दिली. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीकांचे वितरण करण्यात आले. ‘शांतिपर्व-२०२६’ स्नेहसंमेलनाचे बक्षीस वितरण झाले. त्यावेळी शिव छत्रपती शिक्षणसंस्था गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या नेहमीच पाठीशी उभी आहे. शिक्षणक्षेत्रात अत्याधुनिक […] The post शाहू महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘शांतिपर्व’ची धमाल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:22 am

बंजारा टायगर संघटनेचे आंदोलन मागे:मंत्री जयकुमार गोरेंच्या आश्वासनानंतर पेच सुटला, तांडा समृद्धी योजनेतील निधीवाढीवर सकारात्मक चर्चा

बंजारा टायगर संघटनेच्या वतीने राज्यातील बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते. संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत प्रलंबित कामे, निधीवाढ, तसेच तांड्यांच्या मूलभूत सुविधांसंदर्भातील प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेण्याची वेळ मागितली. जयकुमार गोरे यांनी या मागणीची दखल घेत तात्काळ भेटीसाठी वेळ देत आंदोलकांशी मंत्रालयात चर्चा केली. यावेळी आंदोलकांच्या सर्व मागण्या शांतपणे आणि सविस्तर ऐकून घेत संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्रलंबित कामांना गती देणे, मंजूर निधी वेळेत वितरित करणे, तसेच तांड्यांच्या विकासासाठी आवश्यक प्रशासकीय निर्णय लवकर घेण्याबाबत जयकुमार गोरेंनी संबंधित विभागांना सूचना करण्याचे आश्वासन दिले. जयकुमार गोरे यांनी आंदोलकांना संवादाच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी जयकुमार गोरे यांनी दिले. या सकारात्मक भूमिकेची दखल घेत आंदोलकांनी तात्काळ आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याच्या या भूमिकेमुळे तणावपूर्ण परिस्थिती निवळली असून, पुढील कार्यवाहीबाबत प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आंदोलकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हे ही वाचा… सातारा झेडपी अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नियमांनुसार:प्रश्नचिन्हाचे कारण नाही, न्यायप्रविष्ट प्रकरणावर चर्चा थांबवावी – आमदार महेश शिंदे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांच्या जात पडताळणीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर माध्यमांमध्ये सुरू असलेली चर्चा थांबवावी, असे आवाहन कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केले. अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्णपणे नियमांनुसार झाली असून ती वैध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:53 pm

महाराष्ट्रातील भाविकांच्या बसला यूपीमध्ये अपघात:कारला वाचवताना प्रयत्नात बस रेलिंगला धडकली, 2 महिलांचा मृत्यू, 35 जखमी

तीर्थटनासाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांवर काळाने भीषण घाला घातला आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन आध्यात्मिक आनंदाने नेपाळच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या खासगी बसचा वाराणसी-गोरखपूर महामार्गावर उत्तर प्रदेशातील नादगंज जवळील नवसारा येथे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे आणि परिसरातील ४४ भाविक काही दिवसांपूर्वी खासगी बसने धार्मिक पर्यटनासाठी तीर्थयात्रेवर निघाले होते. या भाविकांनी अयोध्या आणि वाराणसी येथील दर्शन आटोपले होते. आज सकाळी ही बस वाराणसीहून नेपाळच्या दिशेने मार्गस्थ झाली असताना ही दुर्घटना घडली. नवसारा परिसरात समोरून येणाऱ्या एका बोलेरो गाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी रेलिंगला जाऊन जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बसचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातात दोन महिलांचा मृत्यू या घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रोहिनखेड येथील रहिवासी सरस्वती पाखरे आणि अकोला जिल्ह्यातील अन्नपूर्णाबाई या दोन ज्येष्ठ महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या ३५ प्रवाशांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची बातमी मोताळा तालुक्यात पोहोचताच धामणगाव बढे आणि रोहिनखेड परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या परिवारातील सदस्य सुरक्षित आहेत की नाही, याची माहिती घेण्यासाठी नातेवाईकांनी प्रशासकीय यंत्रणेकडे धाव घेतली आहे. प्रशासनाची तत्परता आणि मदतकार्य अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. उत्तर प्रदेशचे एसएसपी राकेश मिश्रा यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अपघातातील मृतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली असून, त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश डॉक्टरांना दिले आहेत. जखमींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धेने तीर्थाटनावर निघालेल्या या भाविकांच्या प्रवासाचा अंत इतक्या भीषण अपघातात होईल, अशी पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर दुःखाचे सावट पसरले असून, जिल्हा प्रशासनाकडून मदतकार्यासाठी समन्वय साधला जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:44 pm

धरणाचे पाणी कोरवाहू शेतकऱ्यांना का देत नाही?:प्रा. साहेबराव विधळे गौरव समारंभात ज्येष्ठ विचारवंत भारत पाटणकर यांचा सवाल

अमरावती येथे आयोजित प्रा. साहेबराव विधळे यांच्या गौरव समारंभात ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उचलला. धरणाचे पाणी कोरडवाहू शेतकऱ्यांना का दिले जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित करत शासनाने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली. डॉ. पाटणकर म्हणाले की, कोरडवाहू शेती हा अत्यंत अडचणीचा विषय आहे. सिंचनाची सोय नसणे ही त्यांच्यापुढील सर्वात मोठी अडचण असते, ज्यामुळे अनेकदा शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. यावर शासनाने गांभीर्याने विचार करून उपाययोजना करणे आवश्यक आहे. धरणग्रस्तांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे कार्यकर्ते प्रा. साहेबराव विधळे यांचा गौरव समारंभ आणि त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘संघर्षधारा’ या गौरवग्रंथाचे विमोचन डॉ. पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई अरविंद वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली अभियंता भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नागपूर येथील ज्येष्ठ विचारवंत नागेश चौधरी, मोझरी येथील गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य वेरुळकर गुरुजी, डॉ. प्रतिभा विधळे, पुष्पाताई बोन्डे, माणिकराव गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांची व्यथा मांडताना डॉ. पाटणकर पुढे म्हणाले की, विकास प्रकल्पांखाली अनेक गावे आणि शेतजमिनी जातात, अनेकजण विस्थापित होतात, मात्र त्यांचे योग्यप्रकारे पुनर्वसन होत नाही. अशा स्थितीत प्रकल्पग्रस्तांच्या वाट्याला संघर्ष येतो. त्यामुळेच त्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणे आवश्यक असते. अप्परवर्धा धरणग्रस्तांसाठी प्रा. साहेबराव विधळे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने दीर्घकाळ लढा दिला आणि त्यांना न्याय मिळवून दिला. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय लढ्याच्या इतिहासातील ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे डॉ. पाटणकर यांनी नमूद केले. यावेळी बोलताना नागेश चौधरी म्हणाले की, आज संधी प्राप्त लोक समाजविन्मुख आयुष्य जगण्यावर भर देत आहेत. मात्र प्रा. साहेबराव विधळे यांनी कायम समाजसन्मुख भूमिका अंगिकारून कार्य केले. धरणग्रस्तांचा लढा असो की बहुजन संघर्ष समितीचे प्रबोधनाचे कार्य असो, सर्वांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका घेऊन गुणात्मक कार्य केले. आचार्य वेरुळकर गुरुजी म्हणाले की, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांमध्ये पीडित व्यक्तीच्या संघर्षात उभे राहण्याची प्रेरणा आहे. प्रा. साहेबराव विधळे यांनी विविध चळवळींमध्ये केलेले कार्य असेच असल्याने ते अतिशय मोलाचे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई अरविंद वानखडे म्हणाले की, प्रा. साहेबराव विधळे यांचे जीवनकार्य कष्टकरी, बहुजन समाजाच्या न्यायहक्कांसाठी राहिले आहे. धरणग्रस्तांच्या सोबतीने त्यांनी शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न मांडले. मंडल आयोगाच्या प्रबोधन कार्यात हिरीरीने पुढाकार घेतला, तसेच बहुजन संघर्ष समितीतही कार्य केले. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन त्यांनी मागील पन्नास वर्षे केलेले सामाजिक कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा हा सत्कार एकप्रकारे नव्या सामाजिक चळवळींसाठी ऊर्जा देणारा आहे, असेही वानखडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेंद्र मेटे यांनी केले. प्रारंभी अहाना पाटील आणि अधिराज या दोन चिमुकल्यांनी गीत गायन केले.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:22 pm

समाज कल्याण विभागाच्या समता सप्ताहाला प्रारंभ:14 एप्रिलपर्यंत जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाने 'समता सप्ताह' सुरू केला आहे. हा सप्ताह १४ एप्रिलपर्यंत चालणार असून, या अंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहादरम्यान भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, वक्तृत्व, निबंध स्पर्धा, पथनाट्ये, कार्यशाळा, मेळावे आणि व्याख्यानांचा समावेश आहे. शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे तसेच सामाजिक समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांना प्रोत्साहन देणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी सांगितले की, शाळा, महाविद्यालये आणि शासकीय वसतिगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित स्पर्धा घेतल्या जात आहेत. तसेच, संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे महत्त्व सांगणारी व्याख्याने आणि वक्तृत्व स्पर्धा जिल्हा व विभागीय स्तरावर आयोजित करण्यात आल्या आहेत. १० एप्रिल रोजी समतादूतांद्वारे ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये पथनाट्ये व लघुनाटिकांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांविषयी प्रबोधन केले जाईल. याच दिवशी मार्जिन मनी योजनेवर कार्यशाळा आणि लाभार्थी मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. ११ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली जाईल, ज्यात त्यांच्या सामाजिक कार्यावर व्याख्यान आयोजित केले आहे. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांचे मेळावे, शाळा, वसतिगृहे व महाविद्यालयांमध्ये आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरे घेतली जातील. १२ एप्रिल रोजी 'संविधान जागर' कार्यक्रमांतर्गत भारतीय संविधानाची निर्मिती, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यावर माहिती दिली जाईल. महिलांसाठी विशेष मेळावे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिरे व मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. १३ एप्रिल रोजी जनजागृती शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन असून, शासकीय कार्यालये आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. याच दिवशी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात ऑनलाईन जात पडताळणी प्रमाणपत्रे वितरित केली जातील. सप्ताहाचा समारोप १४ एप्रिल रोजी होईल. या दिवशी शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन कार्यक्रम, विविध व्याख्याने आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विभागाने कळविले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:20 pm

डॉ. दिनेश वाघाडेंची आयएमए अमरावती अध्यक्षपदी निवड:सिताराम बाबा कॉलनीवासियांनी केला सत्कार

डॉ. दिनेश वाघाडे यांची नुकतीच इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या अमरावती शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल सिताराम बाबा कॉलनीतील रहिवाशांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. या सत्कार समारंभात आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक डॉ. राजू डांगे, इच्छापूर्ती गणेश मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर तीनखेडे, माजी अध्यक्ष अरुणभाऊ ठाकरे, प्रा. मिलिंद चुटके आणि कोषाध्यक्ष प्रदीप सागळे उपस्थित होते. त्यांनी संयुक्तपणे डॉ. वाघाडे यांना शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तिका देऊन सन्मानित केले. डॉ. दिनेश वाघाडे यांनी यापूर्वी आयएमएमध्ये उपाध्यक्ष, सचिव आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले आहे. ते सायंटिफिक उपसमितीचे अध्यक्ष तसेच सीडब्ल्यूसी सदस्य आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्याही त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. वैद्यकीय व्यवसायाव्यतिरिक्त, डॉ. वाघाडे अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आहेत आणि फिजिशियन असोसिएशनचे सचिवही राहिले आहेत. सिताराम बाबा कॉलनी येथील इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त ते अनेकदा मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करतात आणि कॉलनीतील रहिवाशांना तातडीच्या वेळी प्राधान्याने वैद्यकीय सेवा देतात. ते हायटेक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक म्हणूनही परिचित आहेत. यावेळी डॉ. वाघाडे यांच्या पत्नी मेघा दिनेश वाघाडे आणि त्यांच्या मातोश्री उपस्थित होत्या.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:19 pm

संख्या पडताळणी अभियान:अमरावती जिल्ह्यात 4.83 लाख विद्यार्थी, बोगस संख्या लवकरच कळणार, तीन टप्प्यात पटपडताळणी

अमरावती जिल्ह्यात विद्यार्थ्यांची खरी संख्या पडताळण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष अभियान सुरू केले आहे. शनिवार, ११ एप्रिल रोजी या पटपडताळणीचा पहिला टप्पा सुरू होत असून, यामुळे शाळेच्या पटावरील खोट्या विद्यार्थी संख्येचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. ही पटपडताळणी तीन टप्प्यांत केली जाईल. ११ एप्रिलनंतर उर्वरित शाळांची पडताळणी १५ आणि २२ एप्रिल रोजी होणार आहे. जिल्ह्यात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या चारही माध्यमांच्या एकूण २ हजार ८७१ शाळा आहेत. या शाळांमध्ये ४ लाख ८३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, ६ हजारांहून अधिक शिक्षक त्यांना शिकवतात. पटपडताळणीसाठी एकूण शाळांना तीन गटांत विभागण्यात आले आहे. ११ एप्रिल रोजी सुमारे ९५० शाळांची पडताळणी करण्याचे नियोजन आहे. शिक्षणाधिकाऱ्यांवर (EO) यासाठी नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, लेखाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील (डायट) शिक्षक हे अधिकारी पटपडताळणी करतील. दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यामुळे त्यांना या पटपडताळणीतून वगळण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकत्याच घेतलेल्या परीक्षेला जेवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, तेवढीच त्यांची संख्या गृहीत धरली जाईल. विद्यार्थ्यांची मोजदाद पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केली जाईल. यासाठी शासनाच्या 'स्टुडंट्स पोर्टल'चा वापर केला जाईल. संबंधित अधिकारी शाळेत पोहोचल्यावर पोर्टल उघडून विद्यार्थ्यांची नावे पाहतील आणि हजेरीपटानुसार उपस्थितीची नोंद करतील. या पटपडताळणीमुळे शिक्षक आणि मुख्याध्यापक धास्तावले आहेत. पडताळणीच्या दिवशी एकही विद्यार्थी गैरहजर राहणार नाही, याची ते विशेष काळजी घेत आहेत. गैरहजेरी टाळण्यासाठी प्रशासनाने विशेष परीक्षांचे नियोजनही केले आहे, जेणेकरून विद्यार्थी उपस्थित राहतील.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:17 pm

अमरावतीत पहिल्यांदाच गौमातेची रक्ततुला:परशुराम जयंतीनिमित्त 19 एप्रिलला कार्यक्रम, रक्तदान शिबिरे सुरू

अमरावतीत पहिल्यांदाच एका गौमातेची रक्ततुला केली जाणार आहे. भगवान श्री परशुराम जयंतीनिमित्त १९ एप्रिल रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी रक्तदान शिबिरांची शृंखला सुरू करण्यात आली असून, त्याद्वारे जमा झालेल्या रक्ताचा वापर तुला करण्यासाठी केला जाईल. या अनोख्या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, श्री माहेश्वरी पंचायत, श्री गोरक्षण संस्था आणि रामचरित मानस परिषद यांसारख्या विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ‘गौ माता सन्मान समिती’ ची स्थापना केली आहे. या समितीमार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गुरुवारी माध्यमांना देण्यात आली. सहसंयोजक सुरेश साबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम गोरक्षण संस्थेत होणार आहे. तत्पूर्वी, धनराज लेन येथील माहेश्वरी भवनातून भगवान श्री परशुराम आणि गौमातेची शोभायात्रा काढण्यात येईल. ही शोभायात्रा सक्करसाथ, जवाहर गेट, प्रभात चौक, सरोज चौक, श्याम चौक, अंबादेवी रोडमार्गे गांधी चौक असा प्रवास करून गोरक्षण संस्थेत पोहोचेल. गोरक्षण संस्थेत परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज आणि राजराजेश्वर माऊली यांच्या उपस्थितीत गौमातेची रक्ततुला केली जाईल. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत. अमरावतीत १२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत एका विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी ॲड. आर. बी. अटल, संयोजक रमेश छांगाणी, प्रचारप्रमुख संजयकुमार राठी, रक्तदान समितीचे प्रमुख महेंद्र भुतडा, दीपक मंत्री आणि नवल चांडक आदी उपस्थित होते. यावेळी गौमातेच्या संवर्धनासाठी गौहत्याबंदी कायद्याची मागणीही करण्यात आली. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी २७ एप्रिल रोजी इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पैदल मार्च काढण्यात येणार असून, सरकारला निवेदन दिले जाईल. या आंदोलनाचा समितीच्या कार्यक्रमाशी थेट संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:11 pm

येवदा-वडनेरला आरोग्य सुविधा द्या:खासदार अनिल बोंडे यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना, विकासकामांचा घेतला आढावा

खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दर्यापूर येथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यासाठी जागा शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, येवदा आणि वडनेर गंगाई येथे अधिक आरोग्य सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. डॉ. बोंडे यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि विविध यंत्रणाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वरील सूचना केल्या. दर्यापूर तालुका शासनाच्या निर्देशांकानुसार अल्पसंख्याक संवर्गात येत असल्याने, या तालुक्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून आरोग्य सुविधा उभारण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. येवदा आणि वडनेर गंगाई येथील रुग्णांच्या विविध तपासण्यांचे नमुने अमरावती येथे पाठवावे लागतात, ज्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. तपासणीची सुविधा त्याच ठिकाणी उपलब्ध झाल्यास रुग्णांची अडचण दूर होईल आणि जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असे डॉ. बोंडे यांनी नमूद केले. यावेळी डॉ. बोंडे यांनी विविध विकासकामांची माहिती जाणून घेतली. यंत्रणांनी लोकाभिमुख कामे करताना आपले उत्तरदायित्व पाळावे आणि शासनाची प्रतिमा मलीन होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. गरजूंना आयुष्मान कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असेही त्यांनी संबंधितांना सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर अतिक्रमणाचा प्रश्न समोर येत असल्याने, नगरपालिकांनी पुढाकार घेऊन शहरातील अतिक्रमणे काढावीत. तसेच, 'सर्वांसाठी घरे' या शासनाच्या भूमिकेनुसार पट्टेवाटप करण्यात यावे, असेही निर्देश त्यांनी दिले. खेलो इंडिया अंतर्गत प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे १४ प्रस्ताव पाठवण्यात यावेत. यावली शहीद येथील शहीद स्मारकासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, अशी खात्री त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून मिळवून घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीत केंद्र सरकारच्या 'नमो उद्यान' आणि 'वड उद्यान' या विषयांवर अधिक चर्चा झाली. वन विभागामार्फत जिल्ह्यात ही उद्याने तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही उद्याने तातडीने पूर्ण करावीत आणि ती तयार करताना झाडांची संख्या अधिक असावी, असेही डॉ. बोंडे यांनी निक्षूण सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:10 pm

इंदापूरमध्ये जय भवानी सोसायटीच्या सचिवला लाच घेताना अटक:नवीन पीक कर्ज मंजूर करण्यासाठी 1000 रुपयांची लाच स्वीकारली

पुणे, प्रतिनिधी: इंदापूर येथील पंधारवाडी येथील जयभवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा सचिव नाना चंद्रकांत बोराटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना रंगेहात पकडले. नवीन पीक कर्ज मंजूर केल्याच्या मोबदल्यात त्याने एका शेतकऱ्याकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारली. ही कारवाई पंधारवाडी येथील सहकारी सोसायटीच्या आवारात करण्यात आली. नाना चंद्रकांत बोराटे (वय 43, रा. मु. पो. गोकळी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सचिवाचे नाव आहे. या प्रकरणी एका 34 वर्षीय शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराची वडिलोपार्जित शेती असून, त्यांनी 24 मार्च 2026 रोजी जिल्हा सहकारी बँकेचे जुने पीक कर्ज भरले होते. त्यानंतर तक्रारदाराने पंधारवाडी येथील जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फत पुणे जिल्हा बँकेकडे नवीन पीक कर्जासाठी प्रस्ताव सादर केला होता. या सहकारी सोसायटीत बोराटे सचिव म्हणून कार्यरत आहे. 7 एप्रिल रोजी तक्रारदार बोराटेला इंदापूर येथील वडापुरी येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भेटले. त्यावेळी बोराटेने त्यांना 2 लाख 76 हजार रुपयांचे पीक कर्ज मंजूर झाल्याचे सांगत, त्या बदल्यात दोन हजार रुपयांची लाच मागितली. शेतकऱ्याला लाच देणे मान्य नसल्याने, त्याने 8 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने लाच मागणीची पडताळणी केली. त्यानंतर, 9 एप्रिल रोजी बोराटेला पंधारवाडी येथील सहकारी सोसायटीच्या आवारात एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजीत पाटील, अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे आणि शैलजा शिंदे यांच्या पथकाने केली.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:08 pm

पुणे ग्रामीण पोलिसांनी तीन खुनांचे गुन्हे उघडकीस आणले:35 गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला बेड्या

पुणे ग्रामीण पोलिसांनी खेड परिसरात झालेल्या तीन खुनांचा छडा लावत रेकॉर्डवरील तिघा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींपैकी एकावर ३५ गुन्हे दाखल आहेत. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ललित दीपक खोल्लम (वय ३८, रा. शिरोली, ता. आंबेगाव), नंदलाल दिलीप होले (वय ३१, रा. कारेगाव, ता. आंबेगाव) आणि निलेश कैलास सणस (वय ३४, रा. कारेगाव, ता. आंबेगाव) अशी आहेत. यातील पहिली घटना १८ मार्च रोजी खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जैदवाडी येथे घडली होती. धनंजय मारुती घेवडे (वय ३३, रा. राक्षेवाडी, ता. खेड; मूळ रा. कारेगाव, ता. आंबेगाव) यांचा डोक्यावर आणि तोंडावर वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांचे भाऊ सचिन मारुती घेवडे यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेचा तपास गुन्हे शाखेचे पथक समांतरपणे करत होते. पोलिसांनी खेड ते वडगाव निंबाळकर या १४५ किलोमीटरच्या रस्त्यावरील ११० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. यातून ललित खोल्लम आणि नंदलाल होले हे सराईत आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही संशयित आरोपी वडगाव निंबाळकर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर २५ मार्च रोजी सापळा रचण्यात आला. आरोपींनी आजूबाजूच्या उसाच्या शेताचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि नदीच्या दिशेने धावले. मात्र, नदीपात्रात उडी मारण्यापूर्वीच दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आले की, मयत धनंजय घेवडे आणि आरोपी होले हे एकाच गावात राहत होते. होले आणि निलेश सणस यांचे घेवडे यांच्याशी काही कारणावरून भांडण झाले होते. याच रागातून खोल्लम आणि होले यांनी लोखंडी रॉड आणि दगडाने मारून घेवडे यांचा खून केला. या गुन्ह्यासाठी निलेश सणस याने इतर आरोपींना पैसे पुरविल्याचेही तपासात उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असताना आरोपी ललित खोल्लम याने श्रीकांत विलास वाडेकर (वय २६) आणि त्यांची आई रुपाली विलास वाडेकर (वय ४६, दोघेही रा. शिरोली, ता. खेड) यांचाही खून केल्याची कबुली दिली. यामुळे आणखी दोन खुनांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी खोल्लम आणि रुपाली वाडेकर यांचे प्रेमसंबंध होते. पैसे मागण्यावरून दोघांमध्ये वारंवार भांडण होत होते. दरम्यान, रुपाली यांचा मुलगा श्रीकांत हाही आरोपी खोल्लमकडे पैशांची मागणी करत होता. याचा राग मनात धरून खोल्लमने श्रीकांतला खेड येथे बोलावून त्याचे अपहरण केले व त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून खून केला. त्यानंतर आरोपी नंदलाल होलेच्या मदतीने श्रीकांतचा मृतदेह मंचर परिसरात जाळून टाकला आणि राख घोड नदीपात्रात टाकली.याप्रकरणी ठाणे शहरातील महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच श्रीकांतची आई रुपाली वाडेकर या आरोपीला “माझा मुलगा कुठे आहे?” अशी वारंवार विचारणा करून भांडण करत होत्या. त्यामुळे आरोपी खोल्लमने रुपाली यांना शिरोली येथील सदनिकेत बोलावून त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली व गळ्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केला. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी खोल्लम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी २ खुनांचे, १ खुनाच्या प्रयत्नाचे, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी असे एकूण ३५ गुन्हे दाखल आहेत. तसेच नंदलाल होले याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल असून दोन्ही आरोपींवर यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सध्या दोघे जामिनावर बाहेर आहेत.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:05 pm

द इक्वाइन कलेक्टिव्हची पुण्यात राष्ट्रीय परिषद:11-12 एप्रिलला अश्व उद्योगाच्या भविष्यावर चर्चा होणार

भारतातील अश्व उद्योगाला औपचारिक स्वरूप देण्यासाठी आणि त्याचे भविष्य घडवण्यासाठी 'द इक्वाइन कलेक्टिव्ह'ने पुण्यात पहिल्या राष्ट्रीय 'द इक्वेस्ट्रियन फोरम' परिषदेचे आयोजन केले आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने ही परिषद ११ व १२ एप्रिल रोजी पुण्यातील हॉटेल हयात येथे होणार आहे. या अश्वारोहण मंचाचे उद्घाटन ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे विपणन आणि शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होईल. द इक्वाइन कलेक्टिव्हच्या संस्थापिका व समन्वयक गायत्री राहुल कराड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पत्रकार परिषदेला नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. एफ. एफ. वाडिया, पुण्याच्या जपलुप्पे इक्वेस्ट्रियनचे सह-संस्थापक रोहन मोरे आणि एमआयटी डब्ल्यूपीयूच्या सीआयएपीचे सह-संचालक प्रा. रविशंकर साहू उपस्थित होते. या मंचाला पूनावाला स्टड फार्म्स, नानोली स्टड फार्म्स आणि नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडिया येथील डॉ. एफ. एफ. वाडिया यांचे सहकार्य लाभले आहे. या परिषदेत भारतातील अश्व उद्योग क्षेत्रातील शेकडो तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यामध्ये डॉ. हसनेन मिर्झा, याशन खंबाटा, गौरव रामपाल, रोहन मोरे, डायना अल शाईर, डॉ. रवी रेड्डी, बर्नार्ड डुव्हरनय, जुट्टा पुटझ आणि उत्पल एस. टाटू यांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी होणाऱ्या पॅनल चर्चेमध्ये दोन मंत्री, कोलकात्याचे ज्येष्ठ पत्रकार आणि अश्वारोहण खेळ व घोड्यांच्या शर्यतींवरील लेखक सायरस जे. मदन आणि ज्येष्ठ उद्योजक व पशुवैद्य डॉ. रवी रेड्डी यांसारख्या दिग्गजांची विविध सत्रे होतील. भारतीय अश्व परिस्थितीवरील धोरणात्मक दृष्टिकोन या विषयावर चर्चा होईल. हिसार येथील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्राचे डॉ. नितीन विरमानी रोग नियंत्रण आणि गतिशीलता या विषयावर बोलतील. केंटकी इक्वाइन रिसर्चचे डॉ. पीटर हंटिंग्टन ऑस्ट्रेलियाहून तरुण घोडे आणि कामगिरी करणाऱ्या घोड्यांसाठी आहार धोरणे या विषयावर मार्गदर्शन करतील. ऑस्ट्रेलियाचे मार्क बर्नेल मूल्य मानांकन या विषयावर आपले विचार मांडतील. ऑल इंडिया मारवाडी हॉर्स सोसायटीचे अध्यक्ष के. आर. गजेंद्र पाल सिंगजी पोसाना 'देशी घोड्यांचा पुनर्वापर' या विषयावर प्रकाश टाकतील. तंत्रज्ञान अवलंबन या संकल्पनेअंतर्गत जपालूप इक्वेस्ट्रियन सेंटर, पुणे येथील रोहन मोरे, द बार्न हाऊस, पुणे येथील रणजीत खेर आणि वायू टेक्नॉलॉजीज, पुणे येथील टीम यांची तीन सादरीकरणे होतील. चंदीगड येथील अश्व शल्यचिकित्सक डॉ. अनहद सिंधू, युनिव्हर्सिटी ऑफ सरे, यूके येथील श्री. ध्रुवपाल सिंग आंचन, वलसाड, गुजरात येथील यशस्वी ऑलिम्पियन अश्वारोहक श्री. इम्तियाज अनीस, यूके येथील अश्व प्रशिक्षक डॉ. डेव्हिड शीरीन, यूके येथील प्रतिष्ठित पशुवैद्य डॉ. डेसमंड लीडॉन हे पशुवैद्यकीय शिक्षण, घोडेस्वारांची तंदुरुस्ती आणि उद्योग क्षेत्राचे स्वरूप या विषयांवर बोलतील. जेपी ब्रँड्स, यूएसए येथील सुश्री जुट्टा पुट्झ या विस्तारक्षम अश्व व्यवसाय उभारण्यावर बोलतील. १२ एप्रिल रोजी सकाळी ९:०० वा. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड कॅम्पसमध्ये दिवसाची सुरुवात घोड्यांच्या थेट प्रात्यक्षिकाने (उपयोजित शिक्षण / सादरीकरण) होईल. त्यानंतर फ्रान्सच्या सुश्री मॉड चॅटेल यांचे फिजिओथेरपीचे थेट प्रात्यक्षिक सत्र होईल. युकेचे बर्नार्ड डुव्हरने हे घोड्यांच्या नाल कामावर (फॅरिअरी) आणखी एक थेट प्रात्यक्षिक सादर करतील. तसेच, या वेळी खालील विषयांवर विशेष सादरीकरणे होतील. या मध्ये संकरण, संघर्ष, कल्याण मानके आणि नीतिमत्ता, अश्व धोरण, घोड्यांची आयात-निर्यात, आणि पशुवैद्यकीय व औद्योगिक दृष्टिकोन या विषयांवर गुजरातच्या वनतारा येथील डॉ. रामनाथन, युके येथील सुश्री झारा पॉली, युके येथील रोली ओवर्स, पुणे येथील स्कूल ऑफ गव्हर्नमेंट एमआयटी डब्ल्यूपीयूचे डॉ. नमेश किल्लेमशेट्टी, पुणे येथील प्रसिद्ध भारतीय अश्वारोहण क्रीडापटू कपिलेश भाटे, नेतृत्व प्रशिक्षक, ब्लडस्टॉक विशेषज्ञ आणि लेखक गौरव रामपाल आणि बंगळूर येथील गॅलोपिन व्हेट क्लिनिकचे डॉ. हसनेन मिर्झा यांसारखे तज्ञ मार्गदर्शन करतील. रविवार, १२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता परिषदेची सांगता होईल.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:02 pm

सातारा झेडपी अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नियमांनुसार:प्रश्नचिन्हाचे कारण नाही, न्यायप्रविष्ट प्रकरणावर चर्चा थांबवावी – आमदार महेश शिंदे

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांच्या जात पडताळणीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर माध्यमांमध्ये सुरू असलेली चर्चा थांबवावी, असे आवाहन कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केले. अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्णपणे नियमांनुसार झाली असून ती वैध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीनंतर महायुतीतील काही सहकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मात्र, या निवडी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडल्या असून अर्ज छाननीवेळी कोणताही आक्षेप नोंदवला गेला नव्हता. त्यामुळे या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जात पडताळणीच्या मुद्द्यावर त्यांनी सांगितले की, प्रिया शिंदे यांच्या कुटुंबाची वंशावळ 1812 सालापासून उपलब्ध असून त्यामध्ये कुणबी समाजाच्या नोंदी आहेत. यापूर्वी अशा नोंदींवर अनेकांना ओबीसी दाखले देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणी माध्यमांमध्ये अनावश्यक चर्चा होऊ नये, असे त्यांनी नमूद केले. कोणालाही आक्षेप असल्यास त्यांनी तो संबंधित प्राधिकरणाकडे मांडावा, असेही त्यांनी सांगितले. राजकीय पार्श्वभूमीवर बोलताना शिंदे म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीतील काही सदस्यांना महाविकास आघाडीशी युती मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी आमच्या बाजूने मतदान केले. कोरेगाव तालुक्यात ओबीसी उमेदवारांना संधी देताना कोणताही अन्याय झाला नसल्याचा दावा त्यांनी केला. महायुतीतील समन्वयाबाबत त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगला समन्वय असून, काही किरकोळ मतभेद असूनही युती एकसंध आहे. “निवडणुकीदरम्यान काही मतभेद झाले असतील, मात्र ते आता मागे टाकून पुढे जाण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले. अडीच वर्षांनंतर सभापती पदासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना संधी दिली जाईल, असा विश्वासही महेश शिंदे यांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 10:58 pm

मुंबई विमानतळावर भीषण आग

मुंबई : मुंबई विमानतळावर आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. विलेपार्ले मुंबई विमानतळावरील टर्मिनल एक वर ही आग लागल्याची घटना घडली असून अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यास प्रशासनाला यश मिळाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच विमानतळ पोलिस, […] The post मुंबई विमानतळावर भीषण आग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 9:58 pm

आमचे हात अजूनही ट्रिगरवरच

तेहरान : इराण आपल्या लेबनानी बंधू आणि भगिनींना कधीही एकटे सोडणार नाही असे सांगत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी इस्रायलला हल्ले करण्याची खुली धमकी दिली आहे. इस्रायलने शस्त्रसंधी झाल्यानंतर लेबनानमध्ये हल्ले केले. ज्यात २०० पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत. त्यानंतर इराणने इस्रायलविरोधात आक्रमक झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हिजबुल्लाहवरील हल्ले सुरूच ठेवणार असल्याचे […] The post आमचे हात अजूनही ट्रिगरवरच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 9:44 pm

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे 'रुल्स' अद्याप प्रलंबित:प्रभावी अंमलबजावणीसाठी अंनिस तर्फे हायकोर्टात धाव, जनहित याचिका दाखल

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियमांची गरज आहे. हा कायदा अस्तित्वात येण्याला 12 वर्षे झालीत तरीही राज्य सरकारने कायद्याला पूरक रुल्स केले नाहीत. त्यामुळे अनेक अन्यायग्रस्त व शोषित व्यक्तींना व्यक्तींना कायद्याची प्रभावी मदत मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे, असा आरोप करणारी जनहित याचिका कोल्हापूर उच्च न्यायालय सर्किट बेंच पुढे दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी दाखल करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर तर्फे अंनिस कार्यकर्त्या सीमा रामदास पाटील, आनंद माने, अभिषेक मिठारी, प्रशांत गोंधळी, अस्मिता दिघे, राजेश वरक, बाळू माली, गीता हसूरकर यांनी ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले, ॲड. सकलेन मुजावर यांच्या मदतीने ही जनहित याचिका दाखल केली आहे. राज्याचे मुख्य सचिव, विधी आणि न्याय विभाग सचिव, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक, महिला व बाल विकास मंत्रालय, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता विभाग यांनी जनहित याचिकेतून प्रतिवादी करण्यात आलेले आहे. याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013' हा कायदा डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी हौतात्म्य पत्करल्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतांना 26/08/2013 रोजी अंमलात आला. परंतु आज 12 वर्षे झाल्यावरही या कायद्याच्या अंमलबजावणी साठी पूरक रुल्स करण्यात सरकारने दाखविलेली उदासीनता म्हणजे बुवाबाजीच्या अत्याचार व शोषणाने त्रस्त असलेल्या व्यक्तींना मानवी प्रतिष्ठेसह जगण्यास अडथळा निर्माण करणे, न्यायाची प्रक्रिया परिणामकारकपणे वापरण्याची संधी नाकारणे आहे. सरकार त्यांची पालकत्वाची भूमिका पार पाडतांना दिसत नाही आणि केवळ बुवाबाजीतून होणारे लैगिक-आर्थिक शोषण झाल्यावरच त्याबाबत चर्चा करतात असा उल्लेख याचिकेतून केलेला आहे. जनहित याचिकेत बाजू मांडणारे ॲड. असीम सरोदे म्हणाले, कि अश्या सामाजिक कायद्यांच्या अंमलबजावणी साठी सरकरने स्वतःहून सक्रिय भूमिका घेणे अपेक्षित आहे. नियमांशिवाय कायदा म्हणजे पांढऱ्या कागदवरील काळे मृत अक्षर असेच अनेकदा असते. अशा कायद्यांच्या व्यवस्थापनात सरकारची निष्क्रीताच अशोक खरात सारख्या भोंदूगिरी प्रवृत्तीला प्रोत्साहक ठरते. अनेक भोंदू बाबांना राजाश्रय मिळतोय त्यामुळे जनहित याचिकेची सुनावणी तातडीने घ्यावी अशी मागणी ॲड. असीम सरोदे यांनी दिनांक 7 एप्रिल रोजी उच्च न्यायालयात केली त्यावर न्या. माधव जामदार व न्या. प्रवीण पाटील यांनी दिनांक 20 एप्रिल रोजी जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल असे नक्की केले. 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013' या कायद्यासाठी त्वरित नियम करावेत, कायद्यात सांगितल्यानुसार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिस दक्षता अधिकारी नेमावेत, अंधश्रद्धेच्या शोषणाला बळी पडणाऱ्यांसाठी सुरक्षा नियम करावेत, अशोक खरात सोबत विविध महिलांचे फोटो व व्हिडीओ प्रसारित झाले आहेत ते सोसिअल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरून काढून टाकावेत, अन्यायग्रस्तांना 'व्हिक्टीम' म्हणून ओळख व सुरक्षा द्यावी, या कायद्यानुसारच्या केसेस विशेष न्यायालयात जलद पद्धतीने चालवाव्यात, व सातत्याने कायद्याबाबत प्रबोधन उपक्रम चालवावेत अश्या मागण्या जनहित याचिकेतून करण्यात आल्याचे ॲड. श्रीया आवले यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 8:04 pm

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावाच्या दौऱ्यावर:नेमके कारण काय? जिल्हा परिषदेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला राजकीय रंग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तीन दिवसांचा सातारा दौरा सुरु झाला असून त्यांच्या दरेगाव भेटीला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हा दौरा अधिकृतपेक्षा खाजगी असल्याचे सांगितले जात असले तरी, अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय नजरेने पाहिले जात आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत मोठे राजकीय नाट्य रंगले होते. या निवडीदरम्यान शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. त्यातच नवनिर्वाचित अध्यक्षांच्या जात प्रमाणपत्रावरून सुरू झालेला कायदेशीर वाद आणि तक्रारदारांनी घेतलेला आक्षेप यामुळे जिल्ह्यातील सत्तासमीकरणे अस्थिर झाली आहेत. या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी सातारा जिल्हा असल्याने मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात 'डॅमेज कंट्रोल' संदर्भात काही ठोस निर्णय घेतले जाण्याची दाट शक्यता आहे. दौऱ्याला राजकीय रंग गुरुवारी दुपारी हेलिकॉप्टरने शिंदे यांचे दरेगावात आगमन झाले. ते येथे मुक्काम करणार असून स्थानिक पातळीवरील काही भेटीगाठी आणि चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद निवड प्रक्रियेतील घडामोडी, त्यानंतर निर्माण झालेला वाद, तसेच सत्तासमीकरणातील बदल यामुळे या दौऱ्याला राजकीय रंग चढला आहे. शिंदेंचा दौरा खासगी की राजकीय? दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि इतर स्थानिक नेत्यांच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या या भेटीकडे लक्ष लागले आहे. विशेषतः जिल्हा परिषद निवडीनंतर शिवसेना आणि भाजपमधील निर्माण झालेल्या तणावाच्या संदर्भात या दौऱ्यात काही राजकीय संदेश दिला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या दरे गावी मुक्कामादरम्यान महत्त्वाच्या बैठका किंवा अंतर्गत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा दौरा केवळ वैयक्तिक की राजकीय रणनीतीचा भाग, याबाबत पुढील दोन-तीन दिवसांत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. एकूणच, मुख्यमंत्र्यांचा हा 'गाव दौरा' केवळ विश्रांतीपुरता मर्यादित नसून, सातारा जिल्ह्यातील बिघडलेले राजकीय समीकरण दुरुस्त करण्यासाठीची ही एक महत्त्वाची 'फिल्डिंग' असल्याचे बोलले जात आहे. हे ही वाचा… बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार:सुनील तटकरेंनी मानले आभार, म्हणाले - त्यांनी सामंजस्यपणा दाखवला बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत अखेर मोठा पेच सुटला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या काँग्रेसने अखेर या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागत केले आहे. तटकरे यांनी काँग्रेसचे आभार मानताना जुन्या राजकीय स्मृतींना उजाळा दिला. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 7:56 pm

धनंजय मुंडेंनी माझा अर्ज बाद करण्यासाठी मुंबईहून वकील पाठवला:बारामती पोटनिवडणुकीत करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आता राजकीय ठिणगी पडली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी करुणा मुंडे यांनी आपला अर्ज कायम ठेवत निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. बारामती पोटनिवडणुकीत माझा अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी मुंबईहून वकील पाठवला होता, असे त्या म्हणाल्यात. करुणा मुंडेंच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतली. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनीही आपला अर्ज मागे घेतल्याने राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला आहे. एकूण 53 उमेदवारांपैकी तब्बल 30 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 23 उमेदवार रिंगणात उरले आहेत. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे-शर्मा यांचे अर्ज कायम आहेत. नेमके काय म्हणाल्या करुणा मुंडे? करुणा मुंडे यांनी आज माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधला. धनंजय मुंडे यांनी माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी मुंबईहून एक नामवंत वकील पाठवला होता. माझ्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता का दाखवली नाही, असा आक्षेप त्या वकिलाने घेतला. एकीकडे मुंडे म्हणतात की मी त्यांची पत्नी नाही, तर दुसरीकडे वकिलामार्फत माझ्या अर्जावर मालमत्तेवरून आक्षेप घेतात, असा दावा करुणा शर्मा यांनी केला. तसेच, अर्ज मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या तीन मोठ्या नेत्यांचे फोन आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ... तर मी माघार घेतली असती करुणा शर्मा यांनी यावेळी बारामतीची पोटनिवडणूक लढवण्यामागचे कारण देखील सांगितले. जर अजितदादांच्या अपघाताचा एफआयआर (FIR) दाखल झाला असता, तर मी उमेदवारी मागे घेतली असती, असे त्यांनी म्हटले. इतक्या मोठ्या व्यक्तीच्या अपघाताची तक्रार जर घेतली जात नसेल, तर उद्या माझ्यासोबत काही विपरीत घडले तर कुणाला सांगायचे? म्हणूनच मी ही निवडणूक लढवत असल्याचे करुणा मुंडे यांनी स्पष्ट केले. घरोघरी जाऊन प्रचार करणार करुणा मुंडे यांनी पुढे स्पष्ट केले की, निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मोठ्या तीन लोकांचे फोन आले होते. मात्र मी ही निवडणूक लढवणार असून, घरोघरी जाऊन प्रचार करणार आहे. तसेच पदयात्रा देखील करणार आहे. करुणा मुंडेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे बारामतीतील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. बारामती पोटनिवडणुकीचा कार्यक्रम बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 30 मार्च 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल होती, तर 7 एप्रिल रोजी छाननी पार पडली. आज 9 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. आता 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी केली जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मे 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 6:49 pm

कोकणातील शेतकऱ्यांना दिली बोगस खते, कीटकनाशके:कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची राजू शेट्टींची कृषी आयुक्तांकडे मागणी

माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे येथे कृषी आयुक्तांची भेट घेऊन बोगस आणि निकृष्ट खते व कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे या निकृष्ट उत्पादनांमुळे मोठे नुकसान झाले असून, त्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली. चालू वर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी अस्मानी आणि सुल्तानी अशा दुहेरी संकटात सापडले आहेत. औषध कंपन्यांच्या दरांवर राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सुमारे ३०० कोटी रुपयांची औषधे खरेदी केली आहेत. औषध कंपन्यांकडून खते, कीटकनाशके, पीजीआर (PGR) आणि बुरशीनाशकांचा वापर कोणत्या पद्धतीने करावा, याबाबत योग्य माहिती न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आंबा पिकासाठी जवळपास ७० हून अधिक कंपन्यांनी औषधांची विक्री केली आहे. या कंपन्यांच्या औषधांच्या किमतीत मोठी तफावत असून, शेतकरी रोखीने औषध खरेदी केल्यास मूळ किमतीच्या ६० ते ६५ टक्के सवलत दिली जाते. गुण नियंत्रण विभागाकडून मोजक्याच कंपन्यांच्या औषधांची तपासणी करण्यात येते, यामुळे बोगस औषध कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी बोलताना माजी आमदार बाळा माने यांनी, आंबा पिकांच्या कीड रोगांच्या औषध फवारणीमध्ये संशोधन विभागाने नेमके काय संशोधन केले, तसेच ज्या औषध कंपन्या बोगस आहेत, त्यांच्यावर गुणनियंत्रण विभागाने काय कारवाई केली, असे प्रश्न उपस्थित केले. १९९० सालापासून गुणनियंत्रण विभाग व कृषी विद्यापीठाकडून फळबाग लागवडीसाठी नाविन्यपूर्ण कोणतेच संशोधन करण्यात आले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. या बैठकीला संचालक गुण नियंत्रक सुनील बोरकर, दापोली कृषी विद्यापीठाचे संशोधक अनिल देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, गणेश गायकर, सुशांत नाईक, प्रशांत शिंदे, प्रकाश बालवडकर, अजय तेली, उमेश वाळके, तिमीर माणगांवकर, सुजीत चौकेकर, दीपक कदम, विनय पाडावे, औषध कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 5:55 pm

पुणे महापालिका डॉ. आंबेडकर जयंतीसाठी देणार अद्ययावत सुविधा:उपमहापौर वाडेकर म्हणाले - यंदाचा उत्सव संस्मरणीय ठरेल

पुणे महापालिकेकडून यावर्षीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे यंदाचा जयंती उत्सव संस्मरणीय ठरेल, अशी ग्वाही उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी दिली. त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. जयंती उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आंबेडकर पुतळा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर वाडेकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक नीलेश आल्हाट, मनपा उपायुक्त परिमंडळ १ माधव जगताप, उपअभियंता बाळासाहेब पंडित, विठ्ठल गायकवाड आणि राहुल डंबाळे उपस्थित होते. महापालिका यावर्षी प्रथमच अनेक नवीन सुविधा उपलब्ध करून देणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा आंबेडकर पुतळा, मंगळवार पेठेतील आंबेडकर भवन आणि कॅम्प परिसरातील आंबेडकर पुतळा या संपूर्ण मार्गावर मंडपाचे आच्छादन घालण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर वाडेकर यांनी दिली. आंबेडकरी चळवळीच्या विचारांचा प्रसार करणारी पुस्तके नागरिकांना पाहता यावीत आणि विकत घेता यावीत यासाठी फोटोझिंकोच्या गल्लीत पुस्तकांच्या स्टॉल्ससाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. तसेच, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या सूचनेनुसार जयंती उत्सव काळात संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार असल्याचेही वाडेकर यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी ज्या ठिकाणी उत्सव साजरा केला जाईल, तेथे रात्री बारा वाजेपर्यंत महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहतील. तेथील सुविधा आणि स्वच्छतेचे नियोजन त्यांच्याकडून केले जाईल. पोलिसांच्या सहकार्याने काही मार्गांमध्ये बदल करून वाहतुकीचे योग्य नियोजन केले जाईल, अशी माहिती उपायुक्त जगताप यांनी दिली. उत्सवाच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा आणि अग्निशामक दलही तैनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर वाडेकर यांनी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. आंबेडकर जयंती किंवा अन्य कोणत्याही महापुरुषांच्या उत्सवावेळी वेळेच्या किंवा आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे. याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास वाडेकर यांनी व्यक्त केला. शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांची योग्य देखभाल होत नसल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची आठवड्यातून एकदा स्वच्छता करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिल्याचेही उपमहापौर वाडेकर यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 5:53 pm

वयोवृद्धाचा खून करून जबरी चोरी, दोन आरोपींना अटक:पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई, 5 गंभीर गुन्हे उघडकीस

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी एका वयोवृद्ध व्यक्तीच्या खून आणि जबरी चोरी प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे खून, दरोडा आणि जबरी चोरीचे एकूण पाच गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. मंचर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दामोदर जयराम मिंडे (वय ६२, रा. थोरांदळे पाईनमळा, ता. आंबेगाव, जि. पुणे) हे त्यांच्या शेतातील घरात झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून लोखंडी पहाराने त्यांच्या डोक्यात वार करून खून केला. आरोपींनी सोन्याची अंगठी, रोख रक्कम आणि मोबाईल असा सुमारे २९ हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. मिंडे यांच्या मुलगी गीतल गावडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. या गंभीर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सुमारे १०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान, आरोपींनी पॅशन मोटारसायकलचा वापर करून खोडद-बेल्हे मार्गे पारनेरकडे पलायन केल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणेवाडी परिसरात सापळा रचून कबीर उंबऱ्या काळे (वय २४) आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. कबीर काळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासात आणखी चार गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास आरोपींकडे करत आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 5:52 pm

बाहेरची औषधे लिहिल्यास डॉक्टरांवर होणार कारवाई!

मुंबई : प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणा-या रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास भाग पाडणा-या डॉक्टरांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. रुग्णालयात औषधे उपलब्ध असतानाही बाहेरील प्रिस्क्रिप्शन देण्याच्या प्रकारांवर राज्य सरकारने लगाम घालण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने सर्व अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांना स्पष्ट निर्देश दिले […] The post बाहेरची औषधे लिहिल्यास डॉक्टरांवर होणार कारवाई! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 5:49 pm

सीजफायरनंतर पाकची नोबेल शांतता पुरस्काराची मागणी

इस्लामाबाद : अमेरिका आणि इराणमध्ये बुधवारी झालेल्या सशर्त युद्धविरामाचे श्रेय घेण्यासाठी पाकिस्तानचा जोरदार आटापिटा सुरू आहे. आता पाकिस्तानला नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी म्हणजे अजबच विनोद आणि अत्यंत हास्यास्पद वाटते. स्थानिक माध्यमे आणि काही संघटना पाकिस्तानला नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी करत आहेत. खरेतर, युद्धविरामाची घोषणा करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड […] The post सीजफायरनंतर पाकची नोबेल शांतता पुरस्काराची मागणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 5:47 pm

वीज कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांची 10 लाखांची फसवणूक:एपीके फाईल पाठवून काढले खात्यातील पैसे, हिंगोली पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई महानगर गॅस पाईपलाईनचे पैसे थकीत असून तातडीने पैसे भरा असा संदेश देत एपीके फाईल पाठवून विज कंपनीच्या अधिक्षक अभियंत्याच्या खात्यातील १० लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ९ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या भामट्यांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील विज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांचे मुंबई येथे घर आहे. ता. ५ एप्रिल रोजी त्यांना एका मोबाईल क्रमाकांवरून संपर्क साधण्यात आला. संपर्क साधणाऱ्या व्यक्तीने त्याचे नांव दीपक जोशी असल्याचे सांगत तुमच्या घराचे महानगर गॅस पाईपलाईनचे पैसे थकलेले असून त्यामुळे कनेक्शन बंद करीत असल्याचे सांगितले. यावेळी चव्हाण यांनी थकीत रक्कम भरण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार भामट्यांनी त्यांच्या मोबाईलवर एपीके फाईल पाठवली. सदर फाईल डाऊनलोड झाल्यानंतर भामट्यांनी चव्हाण यांना ओटीपी मागितला. यावेळी त्यांनी ओटीपी दिल्यानंतर भामट्यांनी मोबाईल बंद केला. त्यानंतर भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून दोन वेळेस प्रत्येकी पाच लाख रुपये या प्रमाणे दहा लाख रुपयांची रक्कम काढून घेतली. दरम्यान, बँकेतून रक्कम काढण्यात आल्याबाबत चव्हाण यांच्या मोबाईलवर संदेश प्राप्त झाला नाही. मात्र त्यांनी त्यांचा ईमेल तपासल्यानंतर त्यात त्यांच्या बँक खात्यातून ता. ५ एप्रिल रोजी दोन वेळा व्यवहार झाल्याचे दिसून आले. या दोन्ही व्यवहारात प्रत्येक पाच लाख रुपये काढण्यात आल्याचेही दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी आज हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी दीपक जोशी नावाच्या भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, उपनिरीक्षक राहुल महिपाळे, जमादार अशोक धामणे, संजय मार्के, शेख मुजीब, गणेश लेकुळे, संतोष करे, शिवाजी ढोंबरे, जोगे, गणेश वाबळे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी सायबर सेलची मदत घेण्याची तयारी सुरु केली असून, ज्या मोबाईलवरून चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्यात आला तो मोबाईल कोणाच्या नावे आहेत याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 5:37 pm

शिर्डी साईबाबा संस्थानला रिलायन्सकडून अन्नदानासाठी मोठी देणगी!

शिर्डी : प्रतिनिधी उद्योगपती अंबानी कुटुंबीय शिर्डी साईबाबांचे भक्त असून साईबाबांच्या दर्शनासाठी अनेकवेळा येत असतात. तसेच वस्तू आणि रोख स्वरूपात साईबाबांच्या चरणी देणगी देत असतात. गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वतीने साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा प्रसादालयात अन्नदानासाठी देणगी दिली आहे. तसेच अंबानी कुटुंबीय नेहमी साईबाबांच्या चरणी निळ्या रंगाचे वस्त्र […] The post शिर्डी साईबाबा संस्थानला रिलायन्सकडून अन्नदानासाठी मोठी देणगी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 5:34 pm

पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाची १२ कोटींची सायबर फसवणूक

पुणे : देशभरात गेल्या काही वर्षांपासून गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. अनेक लोकांची मोठ्या रकमेची फसवणूक होतानाची प्रकरणे समोर येत आहेत. असे असताना पुण्यात ७५ वर्षीय निवृत्त व्यावसायिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी १२ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पुण्यातील हडपसर भागातील ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने फसवणुकीची पोलिसांत तक्रार […] The post पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाची १२ कोटींची सायबर फसवणूक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 5:27 pm

तेल नेण्यासाठी मोजावा लागणार प्रति बॅरल १ डॉलर टोल

तेहरान : इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांचा युद्धविराम झाल्यानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपली पकड अधिक घट्ट केली आहे. जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या अरुंद जलमार्गातून जहाजांची वाहतूक करण्यासाठी इराण आता शिपिंग कंपन्यांकडून क्रिप्टोकरन्सीमध्ये टोलची मागणी करण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणच्या तेल, गॅस, आणि पेट्रोकेमिकल प्रॉडक्ट्स एक्सपोर्टर्सचे प्रवक्ते हमिद हुसैनी […] The post तेल नेण्यासाठी मोजावा लागणार प्रति बॅरल १ डॉलर टोल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 5:21 pm

हेझबोल संबंधीत हर्शी ठार

जेरुसलेम : इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये बुधवारी रात्रभर भीषण हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यात लेबनॉनमधील बंडखोर गट हेझबोलचा प्रमुख नईम कासिम याचा पुतण्या आणि वैयक्तिक सल्लागार अली युसूफ हर्शी याला ठार करण्यात आल्याचा दावा इस्रायलने गुरुवारी दिली आहे. टेलिग्रामवर जारी करण्यात आलेल्या आपल्या निवेदनात इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, आयडीएफने बैरुतमध्ये हेझबोलाचा सेक्रेटरी जनरल […] The post हेझबोल संबंधीत हर्शी ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 5:18 pm

पेट्रोल पंपावर तरुणीची भरदिवसा निर्घृण हत्या:माथेफिरू प्रियकराने गळा चिरून संपवले, संभाजीनगरच्या करमाडमधील घटना;VIDEO

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. भरदिवसा, लोकांच्या गर्दीने गजबजलेल्या पेट्रोल पंपावर एका माथेफिरू तरुणाने आपल्याच प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून केला. या थरारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, करमाड येथील गणपती मंदिराजवळ असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पूजा सुदाम गावंडे ही तरुणी कर्मचारी म्हणून कार्यरत होती. आज दुपारी १२:३० च्या सुमारास ती आपल्या कामात व्यस्त असताना, तिचा प्रियकर सत्यम रावसाहेब गावंडे हा दुचाकीवरून तिथे पोहोचला. दोघांमध्ये काही वेळ शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या सत्यमने अचानक खिशातील धारदार चाकू काढला आणि काही समजण्याच्या आत पूजाच्या पाठीत बुक्का मारून तिला जमिनीवर पाडले आणि तिच्या गळ्यावर सपासप वार केले. एक व्यक्ती वाचवण्यासाठी आला, पण... या हल्ल्यात पूजा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. सत्यम हा पूजावर चाकुने वार करत असताना, पेट्रोल पंपावर उपस्थित एक व्यक्ती तिला वाचवण्यासाठी पुढे आला, मात्र नराधम सत्यमने त्यालाही चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत मागे हटवले. यानंतर सत्यम दुचाकीवर बसून घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओही समोर आला असून, आरोपीच्या डोळ्यात माणुसकीचा लवलेशही उरला नसल्याचे त्यात दिसत आहे. प्रेम प्रकरणातील संशय किंवा वादातून खून झाल्याचा अंदाज घटनेची भीषणता पाहून परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर आरोपी सत्यम गावंडे घटनास्थळावरून फरार झाला. करमाड पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, प्रेमप्रकरणातील संशयावरून किंवा वादातून हा पाशवी खून झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीला पोलिसांकडून अटक भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी हत्या करण्याचे धाडस गुन्हेगारांमध्ये येतेच कसे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. फरार आरोपी सत्यमच्या मुसक्या आवळण्यासाठी करमाड पोलिसांनी विशेष पथके पाठवली. विविध ठिकाणी छापेमारी करत अखेर आरोपीला कचनेर येथून पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे ही वाचा… सिल्लोडला वाहतूक नियंत्रकाची आत्महत्या:वरिष्ठांनी अपमानित केल्याची फिर्याद, आगारप्रमुखासह तिघांवर गुन्हा नोंद‎ आगारप्रमुख व दोन सहायक वाहतूक अधिकाऱ्यांनी अपमानित करून जातिवाचक बोलल्याने अपमान सहन न झाल्याने वाहतूक नियंत्रण शरद विठ्ठल भिवसने (४०, रा. वडोद चाथा, सिल्लोड, ह.मु लक्ष्मी कॉलनी, सिल्लोड) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी शहरातील आनंद पार्क परिसरात दुपारी उघडकीस आली. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 5:13 pm

बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार:सुनील तटकरेंनी मानले आभार, म्हणाले - त्यांनी सामंजस्यपणा दाखवला

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत अखेर मोठा पेच सुटला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या काँग्रेसने अखेर या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागत केले आहे. तटकरे यांनी काँग्रेसचे आभार मानताना जुन्या राजकीय स्मृतींना उजाळा दिला. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिकामी झाली. सध्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात येत होते. पण काँग्रेस निवडणूक लढण्यावर ठाम होती. काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज देखील भरला होता. मात्र आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली. यामुळे काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी आपला अर्ज मागे घेतला असून, बारामतीची निवडणूक आता 'बिनविरोध' होण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे. सुनील तटकरेंनी व्यक्त केली कृतज्ञता काँग्रेसच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागत केले आहे. तटकरे यांनी काँग्रेसचे आभार मानताना जुन्या राजकीय स्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवला आहे. अजित पवार यांनी १९९१ आणि १९९२ मध्ये काँग्रेसच्याच तिकिटावर निवडणूक जिंकली होती. तसेच १९९९ ते २०१४ या काळात लोकशाही आघाडी सरकारमध्ये त्यांनी काँग्रेससोबत राहून महत्त्वाची पदे भूषवली आहेत. काँग्रेसने दाखवलेल्या या सामंजस्याचे मी बारामतीच्या जनतेच्या वतीने मनापासून आभार मानतो. दिल्लीतून सुटला माघारीचा 'टॅब' यावेळी सुनील तटकरे यांनी यावेळी एक महत्त्वाची माहिती दिली की, ही उमेदवारी मागे घेण्यासाठी स्वतः त्यांनी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी संपर्क साधला होता. दिल्लीतील वरिष्ठ पातळीवर झालेल्या या चर्चेनंतरच माघारीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. शरद पवारांच्या भूमिकेवर भाष्य यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भूमिकेवर विचारले असता सुनील तटकरे म्हणाले की, साहेबांची भूमिका लोकशाही मूल्यांना धरून होती. प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता. परंतु, जशी नाशिकच्या पोटनिवडणुकीत राजकीय परिपक्वता पाहायला मिळाली होती, तशीच आता बारामतीतही दिसत आहे. काँग्रेससोबतच्या वादावर पडदा राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत (NDA) हातमिळवणी केल्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेलाही सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिले. आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि ही भूमिका आम्ही उघडपणे मांडली आहे. सपकाळ यांचे राजकारणातील ज्ञान मोठे आहे, आम्हीही अनेक वर्षे काँग्रेससोबत काम केले आहे. आजच्या घडीला त्यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे सांगत तटकरेंनी वादावर पडदा टाकला.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 4:49 pm

शबरीमलाचा निकाल पुरुषांच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेवर आधारित

नवी दिल्ली : केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून सुरू असलेल्या वादाबाबतची सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे घटनापीठासमोर सुरु आहे. या प्रकरणामुळे धार्मिक स्थळांमध्ये महिलांच्या प्रवेशाबाबत आणि धार्मिक स्वातंर्त्याच्या व्याप्तीबाबत व्यापक प्रश्न उपस्थित होतात, असा दावा केंद्र सरकारच्या वतीने आजच्या सुनावणीवेळी करण्यात आला. केंद्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, हे प्रकरण […] The post शबरीमलाचा निकाल पुरुषांच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेवर आधारित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 4:25 pm

साई संस्थान कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट:चार्जशीटमधून नाव वगळलं, तरी अशोक खरात पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात

शिर्डीतील साई संस्थानमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या 2022 मधील मृत्यू प्रकरणात आता मोठी घडामोड घडली आहे. राहाता न्यायालयाने या प्रकरणाचा पुन्हा नव्याने तपास करण्याचे आदेश दिल्याने संपूर्ण प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. याआधी तपासादरम्यान पुरावे अपुरे असल्याचे कारण देत अशोक खरात यांचे नाव दोषारोपपत्रातून वगळण्यात आले होते. मात्र, आता न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्या भूमिकेचा पुन्हा सखोल तपास होणार आहे. मृत व्यक्तीचे नाव विकास रामदास दिवटे (वय 37, रा. शिर्डी) असे आहे. त्यांनी 9 जून 2022 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले होते. या घटनेनंतर त्यांच्या भावाने, राजेंद्र दिवटे यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, विकास दिवटे यांना कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर सासरच्या मंडळींकडून सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागत होता. तक्रारीनुसार, सासरे, मेहुणा आणि साडू यांच्याकडून विकास यांना पत्नी आणि मुलाशी संपर्क साधण्यास अडथळे आणले जात होते. इतकेच नव्हे तर त्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या सगळ्या तणावामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते, अशी माहिती समोर आली होती. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित तिघांसह अशोक खरात यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतही अशोक खरात यांचा उल्लेख असल्याचे तपासात समोर आले होते. मीरगाव (ता. सिन्नर) येथील भोंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्याकडे विकास यांना नेण्यात आले होते. तेथेही त्यांना त्रास देण्यात आला आणि धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या सर्व घटनांमुळे विकास दिवटे यांच्यावर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला होता. पोलिस पुन्हा या प्रकरणाची चौकशी करणार तथापि, तपासादरम्यान पुरावे अपुरे असल्याचे सांगत पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून अशोक खरात यांचे नाव वगळले होते. या निर्णयावर आक्षेप घेत पुन्हा तपास करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर राहाता न्यायालयाने ही मागणी मान्य करत प्रकरणाचा पुनर्तपास करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता या प्रकरणातील सर्व बाबींचा नव्याने आढावा घेतला जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर शिर्डी पोलिस पुन्हा एकदा या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत. विशेषतः अशोक खरात यांचा या घटनेत नेमका काय सहभाग होता, याचा शोध घेण्यावर भर दिला जाणार आहे. या नव्या तपासामुळे प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 4:12 pm

हिंगोली शहरात 4.97 लाखांचा गुटखा जप्त:तिघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली शहरातील पेन्शन पुरा भागामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी तारीख 9 एका घरावर टाकलेल्या छाप्यात 4 लाख 97 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हिंगोली शहरासह जिल्हाभरामध्ये मटका, जुगारअड्डे, गुटखा विक्री, बेकायदेशीर रित्या वाळू वाहतूक करणे तसेच इतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यासाठी पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन,अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्यांचे तसेच स्थानिक गुन्हे शाखेची पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून दररोज अवैध व्यवसायाची माहिती घेऊन त्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. दरम्यान हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागात किरायाने घेतलेल्या एका घरात गुटख्याची पोती साठवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक मयूर रसाळ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार किशोर सावंत, आजम प्यारेवाले, विशाल खंडागळे, चालक प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने एका घरावर छापा टाकला. पोलिसांनी घराची तपासणी केली असता घरामध्ये पोत्यात साठवून ठेवलेला रजनीगंधा पान मसाला, विमल पान मसाला, आर के पान मसाला, तसेच इतर गुटख्याची पोती आढळून आली. पोलिसांनी सदर गुटखा जप्त केला असून या गुटक्याची किंमत चार लाख 97 हजार रुपये एवढी आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आर्यन खान मुस्ताक खॉन, रा. पेन्शनपुरा, शेख अमर शेख अनिस रा. आजम कॉलनी हिंगोली यांच्या सह अन्य एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे, संजय मार्के, गणेश लेकुळे, शेख मुजीब पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 4:08 pm

बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने अखेर माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. परंतु आज आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केले. पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा […] The post बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 3:52 pm

मलाड दिंडोशी दंगलप्रकरणी मोठी कारवाई, अवैध बांधकामांवर बुलडोजर:दंगल, ड्रग्स आणि दहशत; प्रशासनाची कडक भूमिका

मुंबईतील मलाड पूर्व भागातील दिंडोशी परिसरात घडलेल्या दंगलप्रकरणी प्रशासनाने कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. संतोष नगर परिसरात झालेल्या या हिंसाचारानंतर संबंधित आरोपींच्या अवैध बांधकामांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बुलडोजर चालवण्यात आला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये काही महिला आणि अल्पवयीनांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ही दंगल 5 एप्रिलच्या रात्री संतोष नगरमध्ये देवी मरियम्मा पूजेसाठी निघालेल्या त्रिशूल यात्रेदरम्यान घडली होती. लाउडस्पीकरवर भजन लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि त्यानंतर दोन समुदायांमध्ये हिंसक झटापट सुरू झाली. काही वेळातच परिस्थिती गंभीर बनली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तपासादरम्यान या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दंगल भडकवणाऱ्या शेख कुटुंबाचा ड्रग्सच्या अवैध व्यापाराशी संबंध असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घराची झडती घेतली असता तेथून ड्रग्सचे पॅकेट्स जप्त करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या मते, हे कुटुंब बराच काळ परिसरात दहशत निर्माण करत होते. त्यांनी बेकायदेशीरपणे तीन मजली इमारत उभारून त्यावर मोबाईल टॉवरही बसवला होता. दंगलीनंतर महानगरपालिकेने या अवैध बांधकामांबाबत नोटीस बजावली होती. 24 तासांचा कालावधी देऊनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गुरुवारी प्रशासनाने थेट कारवाई करत बुलडोजरच्या सहाय्याने हे बांधकाम पाडले. या मोहिमेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई शांततेत पार पडली. या कारवाईदरम्यान प्रमुख आरोपी सोहेल शेख, शब्बू शेख, फिरोज शेख आणि मुनीर शेख यांच्यासह एकूण 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. मात्र काही स्थानिकांनी आरोप केला की, मुख्य आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी काही निरपराधांवरही कारवाई केली. या आरोपांचीही चौकशी केली जात आहे. कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कृत्ये सहन केली जाणार नाहीत. दंगल, अवैध बांधकाम आणि ड्रग्स तस्करी या सर्व बाबींवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 3:42 pm

गरोदर महिलांवरही खरातचा लैंगिक अत्याचार

नाशिक : प्रतिनिधी भोंदू अशोक खरात प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून एका पाठोपाठ खळबळजनक माहिती समोर येत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिसांकडून खरातची कसून चौकशी सुरू आहे. शेकडो महिलांचे शोषण करणा-या खरातला आज गुरुवारी सुनावणीसाठी कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिका-यांनी कोर्टात कागदपत्रे आणि लॅपटॉप देखील आणला. भोंदू खरात हा लॅपटॉप समोर ठेवून महिलांवर लैंगिक […] The post गरोदर महिलांवरही खरातचा लैंगिक अत्याचार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 3:28 pm

युद्धाच्या छायेतही भारताचा पुरवठा सुरक्षित:15,400 टन एलपीजीसह ग्रीन आशा जहाजाचे जेएनपीएमध्ये आगमन; तणावात मोठी कामगिरी

आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक घडामोड समोर आली आहे. ‘ग्रीन आशा’ नावाचे भारताच्या ध्वजाखालील एलपीजी वाहतूक करणारे जहाज सुरक्षितपणे जेएनपीए बंदरात दाखल झाले आहे. विशेष म्हणजे, इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष सुरू झाल्यानंतर या मार्गाने पोहोचलेले हे पहिले जहाज ठरले आहे. त्यामुळे या घटनेला मोठे सामरिक आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हे जहाज अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करून भारतात पोहोचले. या मार्गावर सध्या तणावपूर्ण परिस्थिती असल्यामुळे जहाजांच्या हालचालींवर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत ‘ग्रीन आशा’ने हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केल्याने भारतीय सागरी व्यवस्थेची क्षमता आणि नियोजनशक्ती अधोरेखित झाली आहे. ‘ग्रीन आशा’ या जहाजामध्ये एकूण 15,400 टन द्रवरूप पेट्रोलियम वायू (एलपीजी) होता. हे जहाज जेएनपीएच्या द्रव टर्मिनलवर सुरक्षितरीत्या आले असून हा टर्मिनल भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपन्यांच्या संयुक्त व्यवस्थापनाखाली कार्यरत आहे. या मोठ्या प्रमाणातील एलपीजीमुळे देशातील इंधन पुरवठा साखळी अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. या प्रवासादरम्यान जहाज, त्यावरील माल आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग पूर्णपणे सुरक्षित राहिल्याची माहिती देण्यात आली आहे. तणावपूर्ण परिस्थितीतही जहाजाने आपले मिशन यशस्वीरित्या पूर्ण केले, यामुळे सागरी सुरक्षेच्या दृष्टीनेही हे यश महत्त्वाचे मानले जात आहे. जहाजाच्या सुरक्षित आगमनामुळे संबंधित यंत्रणांनीही समाधान व्यक्त केले आहे. भारताच्या सागरी ताकदीचे आणि दृढतेचे प्रतीक या घटनेमुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने एक सकारात्मक संदेश गेला आहे. जागतिक स्तरावर तणाव वाढत असताना देखील देशातील आवश्यक इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची क्षमता भारताकडे असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. यामुळे भविष्यात अशा आव्हानात्मक परिस्थितींमध्येही पुरवठा साखळी अबाधित ठेवण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. एकूणच, ‘ग्रीन आशा’चे जेएनपीए बंदरात आगमन हे केवळ एक साधे जहाज आगमन नसून, ते भारताच्या सागरी ताकदीचे आणि ऊर्जा व्यवस्थापनाच्या दृढतेचे प्रतीक ठरले आहे. आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या छायेतही देशाने आपली पुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवत मोठे उदाहरण घालून दिले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 3:27 pm

नागपुरात गॅस सिलिंडरचा काळा बाजार; संतप्त नागरिकांनी अक्षरश: सिलिंडर पळवले

नागपूर : प्रतिनिधी नागपुरातील जरीपटकाच्या नारा दहन घाटाच्या जवळच असलेल्या एका एलपीजी गॅस सिलिंडर एजन्सीच्या गोडाऊनमध्ये आज गोंधळ उडाला होता. गॅस सिलिंडर आज तरी मिळेल या आशेने सकाळपासून तर दुपारपर्यंत उन्हा-तान्हात रांगेत उभे असलेल्या नागरिकांना ज्यावेळी कळलं की आजही सिलिंडर मिळणार नाही, त्यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी अक्षरश: सिलिंडरच घेऊन पळ काढल्याची घटना घडली. सिलिंडरचा काळा […] The post नागपुरात गॅस सिलिंडरचा काळा बाजार; संतप्त नागरिकांनी अक्षरश: सिलिंडर पळवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 3:17 pm

नवीन हंगामातील ज्वारी बाजारात

पुणे : नवीन हंगामातील ज्वारीची आवक सुरू झाली असून, आवक वाढल्याने क्विंटलमागे ३०० रुपयांनी घट झाली आहे. गॅसटंचाईच्या काळात ज्वारी स्वस्त झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. ‘हंगामाच्या सुरुवातीला ज्वारीच्या दरात घट झाली असून, यापुढील काळात दर स्थिर राहणार आहेत. मार्च महिन्यापासून ज्वारीचा हंगाम सुरू झाला आहे. ज्वारीची तीन टप्प्यांत लागवड करण्यात येते. त्यानंतर बाजारात ज्वारीची […] The post नवीन हंगामातील ज्वारी बाजारात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 3:14 pm

गहिनीनाथ गडावर फडणवीसांचे भाष्य चर्चेत:नाशिक प्रकरणावर तपासाची घोषणा, भाविकांकडून मुंडेंना मंत्री करण्याची मागणी

नाशिकमधील आयटी कंपनीत घडलेल्या गंभीर प्रकारावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका घेत सखोल तपास करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर आयोजित 94 व्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात सहभागी होत त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले. याचबरोबर बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसशी संपर्क साधल्याची कबुली देत त्यांनी राजकीय चर्चेलाही वेगळं वळण दिलं. नाशिकमध्ये काही आयटी कंपन्यांच्या माध्यमातून बेरोजगार तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहेत. या प्रकरणात आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगत, अशा प्रकारचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, याचा सखोल तपास होईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी धार्मिक आणि सामाजिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. वामनभाऊंचा वारसा विठ्ठल महाराज पुढे नेत आहेत. आम्ही इथे पदामुळे नाही, तर भक्त म्हणून आलो आहोत, असे सांगत त्यांनी भाविकांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, या गडावर 2039 पर्यंतच्या नारळांचे बुकिंग झाले असल्याचा उल्लेख करत त्यांनी या परंपरेचे कौतुक केले. तसेच वारकरी संप्रदायाच्या सातत्याची आणि शिस्तीची प्रशंसा करत, पंढरपूर दिंडी मार्गासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे आश्वासन दिले. सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकत्र या धार्मिक कार्यक्रमाला राजकीय रंगही चढल्याचे पाहायला मिळाले. मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे सर्व नेते एकत्र आले होते. याआधी एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच व्यासपीठावर दिसल्याने उपस्थितांमध्ये चर्चा रंगली. कार्यक्रमादरम्यान भाविकांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करा, अशी जोरदार मागणी केली. या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हसत प्रतिसाद दिला, मात्र यामुळे राजकीय वातावरणात नवीन चर्चांना उधाण आले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना फोनयाचवेळी बारामती पोटनिवडणुकीबाबत बोलताना फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केल्याचे सांगितले. मी प्राजक्त तनपुरे यांनाही सांगितले होते आणि त्यांनी अर्ज मागे घेतला. त्याचप्रमाणे काँग्रेसनेही विचार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बारामतीतील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यासोबतचा एक जुना फोटो मला भेट म्हणून मिळाला, ते पाहून मला खूप भावनिक वाटलं, असे ते म्हणाले. धार्मिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्वच अंगांनी महत्त्वपूर्ण ठरलेल्या या कार्यक्रमातून अनेक संदेश दिले गेले असून, आगामी काळात याचे परिणाम राज्याच्या राजकारणात दिसून येतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 2:29 pm

बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट

नागपूर : प्रतिनिधी सर्वांचंच लक्ष बारामतीतकडं लागले आहे. काँग्रेसचा उमेदवार आपला अर्ज मागे घेईल की नाही याबाबत तर्क लढवले जात असताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसचा उमेदवार बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेणार असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे उमेदवार अर्ज माघारी घेतील, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ […] The post बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 1:49 pm

मस्साजोगमध्ये सरपंचपदासाठी चुरस:संतोष देशमुख यांच्याकडून पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख मैदानात, अश्विनी देशमुखही सज्ज

मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत मोठा राजकीय कलाटणी देणारा ट्विस्ट समोर आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी गावात प्रयत्न सुरू असतानाच, दिवंगत संतोष देशमुख यांच्याकडून पूर्वी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी अचानक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी आपण सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आज दुपारी एक ते तीन या वेळेत ते आपला अर्ज सादर करणार आहेत. गावातील लोकांनी बिनविरोध निवडणुकीची इच्छा व्यक्त केली तर आम्ही त्याचा आदर करू, पण अंतिम निर्णय मतदारच घेतील, असे त्यांनी सांगितले. गावात एकूण 2,284 मतदार असून, 29 तारखेला सगळं स्पष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनाही उमेदवारी देण्याचा निर्णय देशमुख कुटुंबीयांनी घेतला आहे. त्या आज सकाळी साध्या पद्धतीने अर्ज दाखल करणार आहेत. कुटुंबीयांशी चर्चा आणि ग्रामस्थांचा सल्ला घेऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. अश्विनी देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना, ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, असे मत व्यक्त केले. अण्णांचे अपूर्ण स्वप्न आम्ही पूर्ण करू. गावात पाणीटंचाई होऊ नये आणि विकासाची कामे थांबू नयेत, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे त्या म्हणाल्या. तसेच लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या उमेदवारीवर संयमित प्रतिक्रिया दिली. या घडामोडींवर धनंजय देशमुख यांनीही आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, आजचा अर्ज साध्या पद्धतीने दाखल केला जाणार आहे. संतोष देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ज्यांनी आपला माणूस गमावला आहे, त्यांनाच त्या दुःखाची जाणीव असते. गावाने आमच्या वहिनींच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. नव्या सरपंचाचा कार्यकाळ सुमारे 18 महिन्यांचा दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या पदासाठी निवडून येणाऱ्या नव्या सरपंचाचा कार्यकाळ सुमारे 18 महिन्यांचा असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ गावाचाच नव्हे, तर जिल्ह्याचाही लक्ष लागले आहे. आता बिनविरोधीचा मार्ग मोकळा होतो की थेट लढत रंगते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 1:37 pm

भोंदूबाबा अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलिस कोठडी:नाशिक न्यायालयाचा निर्णय, नकली साप, नशिल्या पेढ्यांचे रहस्य उलगडणार

नाशिकमधील बहुचर्चित आयटी हब आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली आहे. खरातला आज नाशिक सत्र न्यायालयाने तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वीच्या दुसऱ्या गुन्ह्यातील 7 दिवसांची कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायाधीश बी. एन. इचपुराणी यांच्या न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात खरातच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश केला. आरोपी लोकांना नकली साप आणि वाघाची भीती दाखवून लुटत होता. मंतरलेले खडे आणि चिंचोके विकून त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, महिलांना वश करण्यासाठी तो त्यांना विशिष्ट प्रकारचे द्रव्य किंवा पेढे खाऊ घालत असे. या पदार्थांमध्ये नक्की काय मिसळले जात होते आणि ते कुठून आणले जात होते, याचा तपास करणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद: आरोपी सहकार्य करत नाही! सरकारी वकिलांनी 7 दिवसांच्या कोठडीची मागणी करताना सांगितले की, आरोपी अत्यंत हुशार असून तो तपासात सहकार्य करत नाही. त्याच्याकडून जप्त केलेला पेनड्राईव्ह आणि लॅपटॉप यातील माहितीच्या आधारे त्याची समोरासमोर चौकशी करायची आहे. तसेच, नकली खडे पुरवणाऱ्या महेश कलंत्री याच्याशी असलेल्या संबंधांचा आणि गुन्ह्यात वापरलेल्या साहित्याचा शोध घेणे बाकी असल्याचे वकिलांनी नमूद केले. बचाव पक्षाचा विरोध आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला जोरदार विरोध केला. या प्रकरणाचा तपास आधीच एसआयटी (SIT) करत आहे. नकली साप, नाग आणि खड्यांचे विषय यापूर्वीच्या तपासातही आले होते. एकाच विषयावर वारंवार कोठडीची गरज काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच गुन्ह्याचा कालावधी आणि पेनड्राईव्हच्या जप्तीवरही त्यांनी शंका उपस्थित केली. न्यायालयाचा निकाल दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासातील अपूर्ण दुवे लक्षात घेता न्यायालयाने अशोक खरातला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या काळात त्याच्याकडून 'आयटी जिहाद' आणि महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 1:35 pm

पार्थ पवारांच्या शपथविधीत पेहराव ठरला चर्चेचा:अजित पवारांच्या शैलीत गुलाबी जॅकेट परिधान; आवाज-देहबोलीतही त्याच छटा

पार्थ पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार राज्यसभेतील प्रवेशावर चर्चा सुरू होती. त्यांच्या सोबतच्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या इतर सर्व खासदारांचा शपथविधी आधीच झाला होता. त्यामुळे पार्थ पवार कधी शपथ घेणार याबाबत चर्चा सुरू होती. अखेर आज त्यांच्या शपथविधीने त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. या सोहळ्यात मात्र सर्वाधिक लक्ष वेधले ते त्यांच्या पेहरावाने. पार्थ पवार यांनी शपथविधीवेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शैलीतील गुलाबी जॅकेट परिधान केले होते. अजित पवार यांचा खास ओळख बनलेला हा पेहराव पुन्हा एकदा पाहायला मिळाल्याने अनेकांच्या भावना दाटून आल्या. त्यांच्या आवाजात आणि देहबोलीतही काही प्रमाणात अजित पवारांची छटा जाणवत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी सुनेत्रा पवार सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत पार्थ पवारांच्या शपथविधीला अधिकच भावनिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने पाहिले जात होते. दरम्यान, पार्थ पवारांच्या या नव्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शपथविधी सोहळ्यातील त्यांचा साधा पण प्रभावी अंदाज आणि अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देणारा पेहराव यामुळे हा क्षण अनेकांसाठी विशेष ठरला.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 12:59 pm

सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा

पुणे : बारामती अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत आहेत. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसचे आकाश मोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवर चर्चा केली. यानंतर […] The post सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 12:53 pm

प्राचार्याला ब्लॅकमेल करून 7 लाख खंडणी उकळली:पोलिस उपनिरीक्षक, रील स्टार सोनाली हिंगेसह तिघांवर गुन्हा दाखल

पुण्यात एका धक्कादायक घटनेत, प्राचार्याला ब्लॅकमेल करून 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी एका पोलिस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेत कारवाईचे आदेश दिले. या गुन्ह्यात पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, पोलिस कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील मार्शल तथा सोशल मीडियावरील 'रील स्टार' सोनाली हिंगे यांचा समावेश आहे. अजित बडे सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत असून, सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. आरोपींनी संगनमत करून एका शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्याला लक्ष्य केले. त्यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवण्यात आली. अटकेची कारवाई टाळण्यासाठी आणि प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींनी 7 लाख रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या प्राचार्याने ही रक्कम आरोपींना दिली. हा प्रकार खंडणीखोरीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित प्राचार्यांनी वरिष्ठ स्तरावर तक्रार केली. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. खाकी वर्दीचा गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार, बंडगार्डन पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील आरोपी सोनाली हिंगे सोशल मीडियावर 'रील स्टार' म्हणून लोकप्रिय आहे. पोलिस गणवेशातील तिचे रिल्स मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. मात्र, खंडणीच्या गुन्ह्यात नाव आल्याने तिच्या चाहत्यांमध्ये आणि पोलिस दलात चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे पुणे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली असून, बंडगार्डन पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 12:50 pm

पुण्यात तरुणावर गोळीबार, एक गंभीर जखमी:वडगाव बुद्रुकमध्ये पूर्ववैमनस्यातून हल्ला; आरोपींचा शोध सुरू

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे एका तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चरवड वस्तीमधील एका मोकळ्या मैदानात हा प्रकार घडला. या हल्ल्यात सुरज गायकवाड हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरज गायकवाड आपल्या मित्रासह वडगाव बुद्रुक येथील चरवड वस्ती परिसरातील एका मोकळ्या मैदानात थांबला होता. त्यावेळी सोहम खामकर, आर्यन जोगडे, मनोज गीते, प्रेम जाधव आणि त्यांच्या इतर साथीदारांनी त्याला गाठले. जुन्या वादाचे निमित्त करून या टोळक्याने प्रथम सुरज आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरू असतानाच, टोळक्यातील एकाने पिस्तूल काढून सुरजवर थेट गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली. या हल्ल्यात सुरज गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. सोहम खामकर, आर्यन जोगडे, मनोज गीते आणि प्रेम जाधव यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली आहेत. जखमी तरुणाच्या मित्राचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 12:37 pm

संजय राऊत, पुतणा मावशीचं प्रेम दाखवू नका:तुमचा इथल्या यंत्रणेवर विश्वास नाही, मग पाकिस्तानची यंत्रणा नेमायची का? भाजपचा संजय राऊतांना सणसणीत टोला

अजित पवार यांच्या अपघाताचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. उलट सरकारकडून या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. शरद पवारांपेक्षा संजय राऊत मोठे झाले का? असे संशयाचे वातावरण निर्माण केल्याने काहीही होणार नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. संजय राऊतांनी कायद्याचे थोडेस ज्ञान घेतले पाहिजे, अपघात प्रकरणी एडीआरच दाखल होत असतो. दिशा सालियान प्रकरणी एडीआरच दाखल करण्यात आला होता, असेही बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, अजित पवार अपघात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करत तपास सुरू केला आहे. पवार कुटुंबियांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामध्ये संजय राऊत यांनी नाक खुपसू नये. सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना अजित पवार अपघात प्रकरणी काळजी आहे, तुम्ही पुतणा मावशीचे प्रेम दाखवू नका.चौकशीमध्ये जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल. पण हा जर निव्वळ अपघात असेल तर कोणावर कारवाई करायची हा सुद्धा प्रश्न आहे. हा तपासाचा भाग आहे, त्यातून सत्य बाहेर येईल.तुमचा इथल्या यंत्रणेवर विश्वास नाही तुमचा पाकिस्तावर विश्वास आहे तिथली यंत्रणा नेमायची असेल तर आमची काही हरकत नाही. राऊतांनी दुटप्पी धोरण ठेवू नये नवनाथ बन म्हणाले की, अजित पवार अपघात प्रकरणी एफआयआर का दाखल होत नाही असा सवाल जनाब संजय राऊत यांच्याकडून विचारला जात आहे. या प्रकरणी एडीआर दाखल झालेला आहे. कोणताही अपघात झाला तर एडीआरच दाखल होतो. सुशांतसिंह राजपूत यांची संशयास्पद आत्महत्या, दिशा सालियानचा संशयास्पद मृत्यू झाला होता, त्या प्रकरणी तत्कालीन मविआ सरकारने एडीआरच दाखल केला होता, FIR दाखल केला गेला नव्हता. त्यावेळी संजय राऊत यांनी एफआयआर दाखल का केला नव्हता, असा सवाल बन यांनी केला आहे. राऊत तुम्हाला कायद्याचे ज्ञान नसेल तर ते घ्या, थोडा अभ्यास करा. कोणताही अपघात झाला तर एडीआर दाखल होतो त्यातूनच चौकशी होते. अजित पवार प्रकरणी एडीआर दाखल करत तपास सुरू आहे. एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. त्यामुळे दुटप्पी धोरण ठेवणे बंद करा. राऊतांकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावे नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप मोठा भाऊ आहे. अजित पवार अपघात प्रकरणामध्ये संपूर्ण चौकशी करण्याचे काम केले जात आहे. संजय राऊतांकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे तपास यंत्रणाकडे द्यावे. विनाकारण भाजपचा कशामध्ये हात आहे का? असे संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे काहीही साध्य होणार नाही. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. शरद पवारांनी सांगितले की हा अपघात आहे.संजय राऊत शरद पवारांपेक्षा मोठे झाले आहेत का हा संशोधनाचा विषय आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 12:30 pm

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा यू-टर्न:खरगे- शरद पवारांमध्ये चर्चा, फडणवीसांचा सपकाळांना फोन; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडीमुळे बारामतीतील निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे एक तासापूर्वी खरगे आणि पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत बारामती पोटनिवडणुकीतील राजकीय परिस्थिती, स्थानिक भावना आणि पुढील रणनीती यावर विचारविनिमय झाला. त्यानंतर काँग्रेसचा उमेदवार मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे समजते. या चर्चेदरम्यान, बारामतीतील निवडणूक ही भावनिक आणि संवेदनशील पार्श्वभूमीवर होत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यानुसार, राज्यातील राजकीय वातावरण लक्षात घेऊन काँग्रेसने माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. खरगे यांनी स्वतः शरद पवारांना याबाबत आश्वासन दिल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, या निर्णयामुळे बारामतीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असून, आता अधिकृत घोषणा आणि पुढील घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबत लाईव्ह अपडेट खाली पहा…..

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 12:29 pm

राजकारणात मोठा धक्का:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांना फोन; बारामतीतील निवडणुकीबाबत चर्चा

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी आणि अनपेक्षित घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना थेट फोन करून बारामतीतील निवडणुकीबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या संवादामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र काँग्रेसने सुरुवातीपासूनच माघार न घेण्याची भूमिका घेतल्याने लढत अटळ मानली जात होती. अशा परिस्थितीत फडणवीसांनी थेट काँग्रेस नेतृत्वाशी संपर्क साधल्यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती फडणवीसांनी केली. अचंबित करणारा क्षण राज्यातील सत्ताधारी पक्षाचा प्रमुख नेता विरोधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना थेट फोन करून निवडणुकीसंदर्भात चर्चा करणे, ही दुर्मीळ बाब मानली जात आहे. त्यामुळे या घटनेला राज्याच्या राजकारणातील अचंबित करणारा क्षण मानले जात आहे. फडणवीसांच्या या फोननंतर काँग्रेसची भूमिका बदलते का, याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. संपूर्ण पाठिंबा देण्याचा शब्द दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या विषयावर काँग्रेसमध्ये विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे बारामतीतील राजकीय घडामोडींना अधिक वेग आला आहे. याआधी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी संपूर्ण पाठिंबा देण्याचा शब्द दिल्याची माहिती आहे. त्यानंतर लगेचच काँग्रेसशी संपर्क साधल्याने या हालचालींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 12:16 pm

बारामतीत मोठा ट्विस्ट:काँग्रेस माघारीच्या तयारीत; बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा? विजय वडेट्टीवार यांची माहिती

राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर मोठी घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असताना काँग्रेस पक्ष माघार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बारामतीतील निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग जवळपास मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार आज दुपारपर्यंत आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. काल प्रदेशाध्यक्षांसोबत पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत अनेक नेत्यांनी माघार घेण्याच्या बाजूने भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी मागील काही दिवसांत विविध स्तरांवर चर्चा, बैठका आणि संपर्क सुरू होता. अखेर या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्षांकडून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दुपारपर्यंत केंद्रीय नेतृत्वाची परवानगी मिळाल्यास काँग्रेस अधिकृतपणे उमेदवारी मागे घेईल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे बारामतीतील राजकीय चित्रात मोठा बदल होण्याची शक्यता असून, आता अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भातील खालील बातम्या देखील वाचा…. शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला:बारामतीची जागा अपघाताने रिक्त झाली, निवडणूक बिनविरोध व्हावी; शेवटच्या दिवशी निर्णायक क्षण बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. पूर्ण बातमी वाचा…. रोहित पवारांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी बंद दाराआड चर्चा:बारामतीत काँग्रेस ठाम, शेवटच्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. या भेटीत काँग्रेसने बारामतीतून उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी संवाद झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करून निवडणूक लढवण्याचा निर्धार आधीच स्पष्ट केला आहे. पूर्ण बातमी वाचा…

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 12:09 pm

पार्थ पवारांच्या विधानावर रोहित पवारांकडून काँग्रेसची दिलगिरी:अजित पवार प्रकरणी FIR दाखल करण्यास सरकारने विरोध का केला, सुप्रिया सुळेंचा सवाल

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात असतानाच, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन महत्त्वाची चर्चा केली. काँग्रेसबद्दल जे काही वक्तव्य झाले, त्याबद्दल रोहितने दिलगिरी व्यक्त केली आहे. काही चूक-भूल झाली असेल तर माफ करा, अशी विनंती रोहित पवारांनी हर्षवर्धन सपकाळ यांना केल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार का नाही हे दोन-4 तासात समजेलच, असेही त्यांनी म्हटले आहे. पार्थ पवारांच्या विधानावर पत्रकारांनी विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की,आत्या म्हणून मला पार्थला जे काही सांगायचे आहे, ते मी घरात सांगेन. अशा गोष्टी कॅमेऱ्यासमोर बोलायच्या नसतात. रोहित पवारांनी या प्रकरणी मध्यस्थी करत दिलगिरी व्यक्त केली आहे, त्यामुळे आता काँग्रेसची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. FIR का नोंदवला गेला नाही? सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर सर्वात जास्त पाठपुरावा घेण्याचे योगदान हे रोहित पवारांचे आहे. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने हा मुद्दा संसदेत मांडला. आम्ही सर्वांनी दोन्हीकडे हा मुद्दा मांडला. आम्हाला वाटले होते तशी चर्चा यावर झाली नाही. रोहित पवारांनी मांडलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले की आम्ही करू. अजित पवार हे या राज्याचे उपमुख्यमंत्री होते पण काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात या प्रकरणी FIR केला. म्हणजे काँग्रेससोबत अजित पवारांनी अनेक वर्षे काम केले. दादा गेल्यानंतर रोहित पवार यांना FIR दाखल करण्यासाठी काँग्रेसच्या सरकारकडे जावे लागले. पण अजित पवार ज्या सरकारमध्ये होते त्या सरकारने FIR नोंदवण्यास नकार का दिला हा प्रश्न महाराष्ट्राच्या मनात आहे. दमानियांच्या आरोपांची नोंद घ्यावी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अंजली दमानिया एक जबाबदार भारतीय आहेत. त्या सातत्याने चुकीच्या होणाऱ्या गोष्टीवर आवाज उठवताना दिसतात. त्या न घाबरता पारदर्शकपणे अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर मांडत आलेल्या आहेत. दमानियांनी जी माहिती माध्यमांसमोर मांडली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानते. अंजली दमानियांनी सर्व माहिती सरकारला द्यावी आणि महाराष्ट्र सरकारने त्यांची नोंद घेतली पाहिजे. दुसऱ्या कामात व्यस्त होते सुनेत्रा पवार यांनी काल हर्षवर्धन सपकाळ यांना काल फोन केल्यावरून बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, देशावर सध्या मोठे आर्थिक संकट आहे. जागतिक युद्धाचे सावट जरी कमी झाले असले, तरी पेट्रोल-डिझेलचे दर आणि वाढती महागाई सामान्य माणसाचे कंबरडे मोडत आहे. मी या प्रश्नांवर काम करण्यात व्यस्त असल्याने बारामतीच्या निवडणुकीकडे माझे लक्ष नव्हते. प्रशासकीय दिरंगाईवर ओढले ताशेरे राजकारणासोबतच सुळे यांनी स्थानिक प्रश्नांवरही प्रशासनाला धारेवर धरले. शहरात नालेसफाईसाठी मोठा निधी दिला जातो, पण त्याची अंमलबजावणी शून्य आहे. नाल्यांवर रस्ते आणि इमारतींचे अतिक्रमण झाल्याने पावसाळ्यात पाणी तुंबते. अनेकदा निवेदने देऊनही प्रशासन ढिम्म आहे, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी मदतीची हाक अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी, यासाठी सुप्रिया सुळे यांनी आमदार दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. प्रत्येक बाधित शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:47 am

केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे अपघाती निधन

बीड : प्रतिनिधी बीडमध्ये पुन्हा भीषण अपघात झाला आहे. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरच्या नेहरूनगर कॉर्नरवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बीडच्या केज येथे कार्यरत असलेले तहसीलदाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तहसीलदाराच्या मृत्यूने प्रशासकीय कर्मचा-यांवर शोककळा पसरली आहे. बीडमधील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज बुधवारी ( ९ एप्रिल) सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ भीषण कार […] The post केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे अपघाती निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 11:35 am

रब्बीच्या ई पिक पाहणीमध्ये वसमत तालुक्याचे काम जिल्ह्यात अव्वल:42 हजार हेक्टरपैकी 31 हजार हेक्टर क्षेत्रावरील पाहणी पूर्ण, तहसीलदार शारदा दळवीचे नियोजन

हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या ई पिक पाहणीमध्ये वसमत तालुक्याचे काम अव्वल ठरले असून 42 हजार हेक्टरपैकी 31 हजार हेक्टरवरील ई पिक पाहणीचे काम पूर्ण झाले आहे. तर सर्वात कमी 46 टक्के काम कळमनुरी तालुक्याचे झाले आहे. वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांच्या नियोजनामुळे मुदतीमध्ये सर्वात जास्त काम झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्व साधारण क्षेत्र सुमारे 1.50 हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. शासनाकडून नुकसान भरपाईसाठी ई पिक पाहणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमधून जास्तीत जास्त क्षेत्रावरील ई पिक पाहणी करून पिकांचे छायाचित्र ॲपवर अपलोड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पाचही तालुक्यांनी नियोजन करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात पाचही तालुक्यांनी तातडीने रब्बी हंगामासाठी ई पिक पाहणीचे काम हाती घेण्यात आले होते. ता. 31 मार्च हि अखेरची मुदत असल्याने या मुदतीत कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु होती. त्यासाठी प्रत्येक गावांमधून बैठका घेऊन शेतकऱ्यांना ई पिक पाहणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, वसमत तालुक्यात उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शारदा दळवी यांनी पोलिस पाटील, कोतवाल व रोजगार सेवकांची बैठक घेऊन ई पिक पाहणीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या ठिकाणी वेळोवेळी आढावा घेऊन येणाऱ्या अडचणींची सोडवणुक देखील केली होती. त्यामुळेच वसमत तालुक्याचे ई पिका पाहणीचे काम 75 टक्के झाले आहे. तालुक्यातील 42 हजार हेक्टरपैकी 31 हजार हेक्टरवरील पिकांची ई पिक पाहणी झाली आहे. या शिवाय औंढा नागनाथ तालुक्याचे 64 टक्के काम झाले असून 25 हजार पैकी 16 हजार हेक्टरवर पिक पाहणी झाली. कळमनुरी तालुक्यात 46 टक्के काम झाले असून 50हजार पैकी 23 हजार हेक्टरवर पाहणी झाली. सेनगाव तालुक्यात 49 टक्के काम झाले असून 27 हजार हेक्टरपैकी 13 हजार हेक्टरवर पाहणी झाली. तर हिंगोली तालुक्यात 63 टक्के काम झाले असून 31 हजार पैकी 19 हजार हेक्टरवर पिक पाहणी झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:14 am

सुनेत्रा पवारांनी दोनदा फोन करून बिनविरोधसाठी विनंती केली:देवेंद्र फडणवीस म्हणजे झरीतले शुक्राचार्य, निवडणूक लढायला आम्ही सक्षम- हर्षवर्धन सपकाळ

बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी दोन वेळा फोन करत संपर्क साधला आणि बिनविरोध निवडणुकीची विनंती केली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. आपण सभ्यतेने वाटचाल केली पाहिजे असे या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रयत्न करतो आहोत. आमची भूमिका ही सर्वांना माहिती आहे. सत्ताधाऱ्यांनी तसा प्रतिसाद दिलेला नाही. बारामती निवडणूक लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, पण जी विनंती सुरू आहे, त्यासाठी आम्ही चर्चा करतो आहोत. बारामतीमध्ये काँग्रेस संदर्भात बोटं दाखवणे चुकीचे तिथे 53 अर्ज दाखल झाले आहेत. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादीअजित पवार गटातील नेत्यांनी या निवडणुकीसंदर्भात आमच्याशी संपर्क इतक्यादिवस का साधला नाही. त्यांच्या पक्षातील नेत्यांना या निवडणुकीसंदर्भात काही देणं घेणं नव्हते का? असा सवाल सपकाळ यांनी केला आहे. इतके दिवस त्यांनी संवाद का साधला नाही. पक्षश्रेष्ठींना का संवाद साधला नाही. भाजपकडे सगळी सुत्रे सोपवली होती का? असा प्रश्न निर्माण होतो. पार्थ पवारांचे वक्तव्य हे निराधार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बारामतीसाठी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे. काँग्रेसच्या सर्व नेत्यांशी चर्चा करत आम्ही पुढची भूमिका घेऊ. सुनेत्रा पवारांशिवाय आणखी कोणीही आमच्या नेत्यांशी किंवा काँग्रेसशी संपर्क केलेला नाही. पार्थ पवारांचे वक्तव्य हे निराधार आहे. त्यांच्या वाक्यासंदर्भात त्यांना कधीतरी पश्चताप होईल. अजित पवार यांचे पुत्र असल्याने त्यांनी भान राखले पाहिजे. सरकारचे वाभाडे निघण्याचा प्रकार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बारामती पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात आम्ही जी अट ठेवली आहे ती काय चुकीची नाही. अजित पवार अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला तर काँग्रेसचे आकाश मोरे उमेदवारी अर्ज मागे घेणार ही त्यांची भूमिका आजपण कायम आहे. हे होत असताना गुन्हा दाखल करावा ही मागणी करावी लागते. पोलिस स्टेशनमध्ये जात बसावे लागते तिथे पोलिसांशी हुज्जत घालावी लागते. महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नाही म्हणून तो कर्नाटकात दाखल करावा लागतो. हे सर्व सरकारचे वाभाडे निघण्याचा प्रकार आहे. फडणवीस गुन्हा नोंदवू देत नाही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात गुन्हा नोंदवू देत नाही. त्यांच्या मृत्यूची चौकशी होऊ देत नाही. हे झरीतले शुक्राचार्य म्हणून देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत हे सर्वांना माहिती आहे. गु्न्हा दाखल करा अशी मागणी आम्हाला करायची गरजच पडायला नको होती. त्यापूर्वीच गुन्हा दाखल व्हायला हवा होता. हे सरकार मुकं, आंधळं, बहिरं सरकार आहे हे आम्ही विरोधक म्हणून सांगतच होतो. आता हे बेशर्म असल्याचेही दिसून येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:10 am

नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो:खरात अन् ऐंरडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का? लव्ह जिहाद' सर्वांना लागू करा- संजय राऊत

नाशिकमधील खरात बाबा काय मुस्लीम होता का? ऐंरडे काय मुस्लीम होते का? मौला, पादरी होते का? नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो. खरात बाबा हिंदू आहे, ऐंरडे हिंदू आहेत म्हणून हिंदू संघटना नरमाईची भूमिका घेणार आणि इतर धर्मांचे कुणी सापडल्यावर रस्त्यावर येणार हे चालणार नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील आयटी कंपनीत सुरू असलेल्या आयटी जिहादबद्दल बोलताना म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, लव्ह जिहाद हा शब्द सर्वांना लागू झाला पाहिजे. महिलांचे शोषण करणाऱ्यांना हा शब्द लागू पडतो. मोदी संसदेत महिलांच्या न्याय हक्कासाठी बिल आणताय पण त्यांना कोणीतरी सांगितले पाहिजे असे हक्क देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी महिलांना असे हक्क दिले होते. याचे श्रेय महाराष्ट्राला जाते. अशा राज्यात बुआ उदयाला येत आहेत ते सर्व भाजपचे प्रचारक आहेत. याचा भाजपशी संबंध आहे त्यावर बोलले पाहिजे. FIR बद्दल मागणी सुनेत्रा पवारांनी करायला हवी संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघतासंदर्भात महाराष्ट्रात FIR दाखल करा ही रोहित पवार यांची मागणी आहे. तीच मागणी हर्षवर्धन सपकाळ आणि आकाश मोरे करत आहेत. स्वत: मुख्यमंत्री सांगताय की अजित पवार यांच्या अपघाताबद्दल खोलपर्यंत जात तपास करू. त्यासाठी FIR नोंदवावा लागेल. विमान कंपनीवर गुन्हा दाखल करायला तुम्ही तयार नाहीत मग या प्रकरणी तुम्ही सखोल तपास कसा करणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. खरंतर ही मागणी सुनेत्रा पवार यांनी करायला पाहिजे. अजित पवारांच्या दोन्ही मुलांनी केली पाहिजे. पण ती मागणी रोहित पवार, काँग्रेस, आकाश मोरे आणि आम्ही सर्व जण करत आहोत. मोरे यांच्या मागणीचा विचार झाला तर उपकार होतील. कर नाही त्याला डर कशाला? असा सवाल राऊत यांनी केला आहे. यामध्ये मोठ्या भावाचा हात आहे का? संजय राऊत म्हणाले की, भाजपकडून विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल केले जातात, पण त्यांचा जवळचा सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा जीवाभावाचा सहकाऱ्यांच्या मृत्यू संदर्भात गुन्हा का दाखल केला जात नाही. लहान भावाचा मृत्यू कसा झाला याचा तपास झाला पाहिजे की यामध्ये मोठ्या भावाचा हात आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यावर सर्वांचे एक मत होईल. पण जी मागणी आहे, FIR करा ती का सोडत आहेत. निवडणूक एक निमित्त आहे ही संधी आहे गुन्हा दाखल करूण घेण्याची. सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील हे सांगायला कोणाची गरज नाही. पार्थ पवारांना अभ्यास करावा लागेल संजय राऊत म्हणाले की, पार्थ पवार यांना अभ्यास करावा लागेल. त्यांनी आजोबांकडून काही धडे घेतले पाहिजे. त्यांच्या वडीलांचा इतिहास त्यांनी चाळला पाहिजे. त्यांना राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्यांनी त्या पद्धतीने काम केले पाहिजे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 10:47 am

शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला:बारामतीची जागा अपघाताने रिक्त झाली, निवडणूक बिनविरोध व्हावी; शेवटच्या दिवशी निर्णायक क्षण

बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवार यांना सल्ला देण्याचा अधिकार असल्याचे मान्य केले. मात्र, या विषयावर अंतिम निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसने अजून अंतिम भूमिका जाहीर केलेली नसली तरी पक्षामध्ये विचारमंथन सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. आपली भूमिका केवळ सल्ल्यापुरती मर्यादित - शरद पवार काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे स्पष्ट करत शरद पवार यांनी थेट हस्तक्षेप न करता आपली भूमिका मांडली. मात्र, ही जागा अपघाताने रिक्त झाली असल्याने महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान प्रतिनिधी गमावला आहे, याची जाणीव ठेवून या निवडणुकीकडे पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याच अनुषंगाने, ही पोटनिवडणूक बिनविरोध पार पडावी, असा सल्ला आपण काँग्रेसला देऊ इच्छितो, असे शरद पवार यांनी नमूद केले. तथापि, अंतिम निर्णय हा काँग्रेसनेच घ्यायचा असून आपली भूमिका केवळ सल्ल्यापुरती मर्यादित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवार यांचेही बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी आक्रमक प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी सपकाळ यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती केली. या बैठकीत त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशीही चर्चा केली. बंद दाराआड झालेल्या या संवादात अजितदादांसारखा मोठा नेता गेल्यानंतर ही निवडणूक भावनिक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे, असे मत रोहित पवार यांनी मांडले. मात्र काँग्रेसने आपली भूमिका ठाम ठेवली आहे. अजित पवार प्रकरणात योग्य तपास आणि कारवाई होणे गरजेचे असल्याचा मुद्दा काँग्रेसने पुढे केला आहे. एवढ्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूनंतरही जर तपासाला गती मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांना न्याय कसा मिळणार? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. याच कारणामुळे काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. काँग्रेस काय निर्णय घेते, याकडे लक्ष काँग्रेस हा स्वतंत्र विचारांचा पक्ष असल्याचे नमूद करत रोहित पवार यांनी पुन्हा एकदा माघारीची विनंती केली आहे. कुटुंबातील सदस्य आणि अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून मी ही विनंती करत आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेसमध्येही या विषयावर अंतर्गत चर्चा सुरू असल्याची जाणीव होत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, पार्थ पवार यांच्या अलीकडील वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीबाबत रोहित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते विधान चुकीचे होते. आता सर्वांनी एकत्र येऊन पुढे जाण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस काय निर्णय घेते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 10:45 am

उमरदरी शिवारात तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली:लोणार येथील तरुणाचा मृतदेह असल्याचे स्पष्ट, खूनाचे नेमके कारण शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू

सेनगाव तालुक्यातील उमरदरी शेत शिवारात बुधवारी तारीख 8 सकाळी मृत अवस्थेत आढळून आलेल्या तरुणाची ओळख पटली असून सदर मृतदेह विदर्भातील लोणार येथील सचिन राजगुरू या तरुणाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आता पोलिसांनी त्याच्या खुनाचे नेमके कारण शोधण्याची प्रयत्न सुरू केले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील उमरदरी फाट्याजवळ एक अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाची वय सुमारे पंचवीस वर्षे असून त्याच्या उजव्या हातावर सचिता व एक पाऊल गोंदलेले (टॅटू )काढला असून तर दुसऱ्या हातावर मॉम डॅड व आई वडील लहान मुलाचा हात धरलेला असे छायाचित्र (टॅटू) काढलेले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सेनगांवचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक नागनाथ पाटील,जमादार जीवन मस्के, सुभाष चव्हाण, ओमनाथ राठोड,अमोल चिकने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणे केली आहे. मयताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेण्याचे प्रयत्न चालवले होते. यासोबतच पोलिसांनी मृतदेहाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली होती. उमरदरा शिवारापासून विदर्भ सीमा लागूनच असल्यामुळे पोलिसांनी विदर्भातही मृतदेहाची माहिती व्हायरल केली होती. मृतदेहाची ओळख पटेपर्यंत मृतदेह हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातील शवागारामध्ये ठेवण्यात आला. दरम्यान रात्री उशिरा मृतदेहाची ओळख पटली असून सदरील मृतदेह लोणार येथील सचिन राजगुरू या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यानुसार पोलिस ांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असल्याचे सांगितले. मयत सचिन हा पुणे येथे कामाला होता. मागील पाच वर्षापासून तो गावाकडे राहू लागला होता. त्याचा विवाह झाला होता मात्र काही कारणामुळे फारकत झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान आता मयत सचिन याचा खून कोणी केला याचा शोध लावण्यासाठी सेनगाव पोलिसांचे पथक लोणार कडे रवाना झाले आहे याशिवाय. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक दिलीप मोरे, जमादार धनंजय क्षीरसागर, भुजंग कोकरे, आकाश टापरे विशाल खंडागळे,साईनाथ कंठे, हरिभाऊ गुंजकर, गजानन पोकळे यांचे पथकही अधिक माहिती घेण्यासाठी लोणार कडे रवाना झाल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले. अनैतिक संबंधातून खून झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या दृष्टीने माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 10:19 am

भीषण अपघातात केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मृत्यू:लातूर-अंबाजोगाई मार्गावर दुर्घटना; तरुण अधिकाऱ्याच्या मृत्यूने हळहळ

केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. एका कर्तव्यदक्ष आणि तरुण अधिकाऱ्याचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते. पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या खाली घसरून पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रेणापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी गाडीत ते एकटेच होते. पहाटेचा वेळ असल्याने परिसरात फारशी वर्दळ नव्हती. मात्र अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे प्रशासन आणि स्थानिक पातळीवर हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्तव्यनिष्ठ आणि कामसू अधिकारी म्हणून ओळख असलेल्या राकेश गिड्डे यांच्या अकाली जाण्याने महसूल विभागाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने सहकारी, मित्रपरिवार आणि नागरिकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 10:12 am