जिल्हा बँकेच्या १०२ कर्मचा-यांनी केले रक्तदान
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी व गटसचिव संघटनेच्या वतीने जिल्हा बँकेच्या मुख्यालयात दि. १८ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात १०२ कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार वैजनाथराव शिंदे व लातूर […] The post जिल्हा बँकेच्या १०२ कर्मचा-यांनी केले रक्तदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मोफत अस्थिरोग शिबिरात ७७ रुग्णांची तपासणी व उपचार
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग तपासणी व उपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ७७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. लातूरचे ज्येष्ठ अस्थिशल्य चिकित्सक डॉ. अशोक पोद्दार लातूर शहरात मोफत आरोग्य शिबीर सुरु करण्याकामी अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व […] The post मोफत अस्थिरोग शिबिरात ७७ रुग्णांची तपासणी व उपचार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पोकरा योजने अंतर्गत खरीप हंगाम पूर्व नियोजन कार्यशाळा
लातूर : प्रतिनिधी बदलत्या हवामानाचा शेतीवर होत असलेल्या प्रतिकूल परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी शेतक-यांनी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीस शाश्वत उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जात आहे. त्याअनुषंगाने विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय लातूर व मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र […] The post पोकरा योजने अंतर्गत खरीप हंगाम पूर्व नियोजन कार्यशाळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मल्लिका फॅशन लाइफस्टाइल प्रदर्शनाला प्रतिसाद
लातूर : प्रतिनिधी सेन्ट्रल इंडियाची सुप्रसिद्ध मल्लिका फॅशन अॅण्ड लाइफस्टाइल एक्झीबिशन लातुर येथील दिवानजी मंगल कार्यालयामध्ये दि. १८ व १९ एप्रिलपर्यंत सुरु आहे. या प्रदर्शनाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन फॅशन डिझायनर वैशाली गिरी, रेसीन आर्टिस्ट तनिष्का मनिष बोरा, डॉ संध्या करड, सानिका ककनाटे, आकांशा नवदिंगे, प्रो. डॉ. क्रांती विठ्ठलराव मोर, गायत्री […] The post मल्लिका फॅशन लाइफस्टाइल प्रदर्शनाला प्रतिसाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिक्षण संस्थाचालक संघाच्या शिबिरात १५१ जणांचे रक्तदान
लातूर : प्रतिनिधी माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाच्या वतीने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात १५१ जणांनी रक्तदान केले. यानिमित्त १५१ अंध व्यक्तींना कपडेही वाटप करण्यात आले. शहरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या साने गुरुजी विद्यालयात झालेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महापौर जयश्रीताई सोनकांबळे यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून […] The post शिक्षण संस्थाचालक संघाच्या शिबिरात १५१ जणांचे रक्तदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
८,९१६ जणांची मोफत नेत्र तपासणी; ७६९ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार
लातूर : प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून दि. १८ एप्रिल रोजी सर्वात मोठा ‘आरोग्य जागर’ आयोजित करण्यात आला होता. जिल्हाभरात एकचवेळी १३ ठिकाणी झालेल्या शिबिरांत ८ हजार ९१६ पेक्षा अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी व […] The post ८,९१६ जणांची मोफत नेत्र तपासणी; ७६९ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर शहरात ‘दुर्मिळ झाडांची देवराई’ साकारणार
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यात ख-या अर्थाने वृक्ष चळवळ रुजवणारे संवेदनशील नेतृत्व, सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा देवराई येथे १०० दुर्मिळ झाडे लावण्याच्या प्रकल्पाचा शानदार शुभारंभ करण्यात आला. येथील औसा रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया समोरील परिसरात हा कार्यक्रम पार पडला. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी १९९३ मध्ये […] The post लातूर शहरात ‘दुर्मिळ झाडांची देवराई’ साकारणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
घाटलाडकी परिसरात आगीच्या दोन घटना:संत्रा बागा जळाल्या, शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी
घाटलाडकी परिसरात आगीच्या घटनांमुळे संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण प्रणालीतील बिघाडामुळे स्पार्किंग होऊन ठिणग्या पडल्या आणि गवत पेटल्याने आग लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महसूल विभागाने या घटनांचा पंचनामा केला असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महावितरणकडे माहिती पाठवली आहे. गेल्या चार दिवसांतच दोन मोठ्या आगीच्या घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरवाडी येथील शेतकरी मंगेश तर्हेकर यांच्या शेतात विजेच्या स्पार्किंगमुळे आग लागली. यात त्यांच्या संत्रा बागेला मोठी झळ पोहोचली असून, अनेक फळधारक झाडांचे नुकसान झाले आहे.तसेच, मौजा सांभोरा येथील शेतकरी जानराव लोखंडे यांच्या शेतात लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमुळे मुजीबुर रहमान यांच्या शेतातील संत्रा, सागवान आणि सीताफळाची झाडे जळून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या सर्व घटनांचे पंचनामे झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी होत आहे. वीज वितरण कंपनीने जबाबदारी स्वीकारून नुकसानभरपाई द्यावी, तसेच वीज यंत्रणेची तातडीने देखभाल व दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
एप्रिल महिन्यातील वाढत्या तापमानामुळे वन्यजीव आणि पक्ष्यांना मोठा फटका बसत आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तिवसा तालुक्यातील वन्यजीवप्रेमी शुभम विघे आणि सागर अटाळकर यांनी 'पक्ष्यांसाठी अन्न व पाणी' हा संवेदनशील उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत, त्यांनी मित्रपरिवाराच्या सहकार्याने विविध गावांमध्ये झाडांच्या सावलीत, मोकळ्या जागांमध्ये आणि सुरक्षित ठिकाणी पाण्याची भांडी (परळ) ठेवण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच पक्ष्यांसाठी धान्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या तिवसा आणि अमरावती तालुक्यातील मोझरी, अनकवाडी, मालधुर, ब्राम्हणवाडा गोविंदपूर, शिवणगाव आणि काटपूर या गावांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमामुळे अनेक पक्ष्यांना उन्हाच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळत आहे. स्थानिक नागरिकांकडूनही या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. समाजसेविका सोनिया गुप्ता, तसेच साहिल चावके, पवन भिवगडे, भूषण निकोशे, दर्शन खुळे, आकाश भुयार आणि कुणाल खुळे यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला आहे, ज्यामुळे हा उपक्रम अधिक व्यापक होत आहे. याबाबत बोलताना शुभम विघे आणि सागर अटाळकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर किंवा परिसरात लहान पाण्याची भांडी ठेवून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी, असे ते म्हणाले. आपल्या छोट्या प्रयत्नातून मोठा बदल घडू शकतो, त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. हा उपक्रम केवळ काही गावांपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण तालुकाभर राबवण्याचा संबंधितांचा मानस आहे. येत्या काही दिवसांत भटक्या जनावरांसाठीही पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक पाण्याचे भांडे ठेवल्यास अनेक पशु-पक्ष्यांचे प्राण वाचू शकतात, असा संदेश ही चमू सर्वदूर पोहोचवत आहे.
गतवर्षीचा पीक विमा मिळाला नाही:खंडाळा खुर्दच्या शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खंडाळा खुर्द, जावरा मोळवण, रोहना आणि मुंडवाडा परिसरातील शेतकऱ्यांना मागील हंगामातील सोयाबीन, तूर आणि कापूस पिकाचा विमा अद्याप मिळालेला नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर धडक दिली आणि आपली कैफियत तहसीलदारांपुढे मांडली. मागील वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने पंचनामे करून नुकसानाची नोंद घेतली आणि काही प्रमाणात मदतही दिली. मात्र, पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विशेषतः सोयाबीन पीक काढणीच्या टप्प्यावर असताना आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर, संबंधित गावांतील शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात एकत्र येत तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देताना खंडाळा खुर्दचे सरपंच उमेश दहातोंडे, रोहना येथील सरपंच अमरीश काकडे, तसेच नरेश ठाकरे, निलेश ठाकरे, मोहन ठाकरे, नयन ठाकरे, कैलास लांडे, अर्पित काकडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. केवळ नांदगाव खंडेश्वरच नव्हे, तर इतर तालुक्यांतूनही पीक विम्याची रक्कम न मिळाल्याच्या अशाच तक्रारी समोर येत आहेत. काही शेतकऱ्यांना तर मागील वर्षी झालेल्या नुकसानाची भरपाईही अद्याप मिळालेली नाही. ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान होऊनही, त्यांची शेतं ज्या महसूल मंडळात येतात, तेथे अतिवृष्टीची नोंद नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही, अशी स्थिती आहे. मागील वर्षीची ही परिस्थिती असताना, यावर्षीच्या खरीप हंगामात दुष्काळसदृश स्थितीची नोंद झाली, तर आता रबीची पिके काढणीला असताना अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.
परसापूर येथील गोपाळकृष्ण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठत्वाचा गौरव, कर्तृत्वाचा सन्मान या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामनारायणसिंह खनवे आणि त्यांच्या पत्नी सजलाबाई खनवे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला. रामनारायणसिंह खनवे यांचा जन्म १ जुलै १९४७ रोजी परसापूर येथे झाला. त्यांनी बी.ए., डी.पी.एड.चे शिक्षण पूर्ण केले. १९६६ ते १९७१ या काळात त्यांनी अचलपूर व धारणी येथे शिक्षक म्हणून सेवा बजावली. वडिलांच्या निधनानंतर कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. सन २००९ मध्ये त्यांनी परसापूर येथे ग्रामीण भागातील पहिला ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला. सध्या ते फेस्कॉम संघटनेचे संपर्क सचिव म्हणून चौथ्या टर्ममध्ये कार्यरत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या गोपाळकृष्ण ज्येष्ठ नागरिक संघाला २०२६ मध्ये भुवनेश्वर येथे राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. खनवे दाम्पत्याने आपल्या सहा अपत्यांना उच्चशिक्षित केले असून, त्यांची ज्येष्ठ कन्या न्यायाधीश तर ज्येष्ठ पुत्र समाजकल्याण विभागात निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. वयाच्या ७८ व्या वर्षीही सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या खनवे दाम्पत्याचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र व महाराणा प्रतापची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला. माजी प्राचार्य दिलीपसिंह खांबरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभागाच्या ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे, अखिल भारतीय वरीष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष प्रकाशराव पिंपरकर, अंतर्गत तपास अधिकारी विनायकराव पांडे, प्रभाकरराव उमक, ले. कर्नल लक्ष्मणराव गाले, माजी प्र-कुलगुरु वसंतराव जामोदे, डॉ. मुरलीधर वांगे, जयानंद खरड, प्रभाकरसिंह टेहरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एस. पवार यांनी केले, तर ॲड. प्रमोद खनवे यांनी आभार मानले. पारंभी प्रभुदास फंदे, अनिलराव वानखडे व वैष्णवी यांनी सुमधुर संगीत रजनीचा कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता, श्री गजानन महाराज आणि दर्शनसिंह ठाकूर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. भुवनेश्वर येथील अधिवेशन व सहलीसाठी सहभागी असलेले सचिव डॉ. श्री चंदनसिंह राजपूत, वेणूताई गावंडे, संजय खोंडे, नीताताई खोंडे, अनिल वानखडे, मायाताई वानखडे, मधुकरराव भोपाळे, प्रदीप सातपुते, राजेंद्र राठी, घनश्याम मेश्राम, सुरेश शिर्के, प्रभाताई शिर्के, ॲड. शामराव कपाळे, राधे राधे महिला मंडळाच्या अध्यक्ष शांताबाई खांबरे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
भाजपचे तिवसा तालुका उपाध्यक्ष प्रवीण बडकस (वय ४३, रा. मारडा) यांचे शुक्रवारी रात्री रस्ता अपघातात निधन झाले. मारडाजवळ त्यांची दुचाकी विद्युत खांबावर आदळल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण बडकस हे कुऱ्हा येथील कामे आटोपून रात्री दुचाकीने आपल्या गावी मारडा येथे परतत होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास मारडाजवळ अचानक त्यांचे वाहन अनियंत्रित झाले आणि ते एका विद्युत खांबावर आदळले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना अमरावती येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी दुपारी मारडा येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार राजेश वानखडे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, प्रदीप गौरखडे, धीरज केने, संदीप आमले, अजय गुल्हाने, रवींद्र हांडे, मनोज अडसड, विठ्ठल रुक्मिणी संस्थेचे अतुल ठाकरे, सरपंच, उपसरपंच आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि मोठा आप्त परिवार आहे.
मोर्शी येथे प्रजापिता ब्रह्मकुमारीज् ईश्वरीय विश्वविद्यालयतर्फे 'खुशियों का पासवर्ड' या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. सचिन परब यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याच्या तणावपूर्ण जागतिक परिस्थितीत 'परिस्थिती कठीण आहे पण मी स्थिर आहे,' हे वाक्य मनाला सांगणे हाच 'खुशियों का पासवर्ड' आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारीज् च्या स्थानिक केंद्रात सुरू झालेल्या या सकारात्मक ऊर्जा प्रदान करणाऱ्या कार्यक्रमात डॉ. परब यांनी तणावमुक्त जीवनासाठी योगा आणि मेडिटेशनचे महत्त्व अधोरेखित केले. मोर्शीकर जनतेसाठी तणावमुक्त जीवन जगण्याची ही एक चांगली संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. हा कार्यक्रम १९ एप्रिलपर्यंत दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सुरू राहणार आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारीज् च्या मोर्शी केंद्राने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा स्थानिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. परब यांनी यावेळी केले. डॉ. परब यांनी आपल्या संबोधनात अनेक उदाहरणे दिली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला प्रतिकूल परिस्थितीतही धीराने कुटुंब सांभाळते, तसेच अरुणिमा सिन्हा या खेळाडूचे उदाहरण देत त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे महत्त्व सांगितले. सध्याच्या जागतिक युद्धजन्य स्थितीत राजयोगाचे मेडिटेशन खूप उपयुक्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राजयोगिनी ब्रह्मकुमारी सीतादीदी, नगराध्यक्षा प्रतीक्षाताई गुल्हाने, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, रवींद्र गुल्हाने, डॉ. दीपक ढोले, बबलूभाऊ अंगनाणी, नितीन पन्नासे, धावडेताई, प्रदीप खोडस्कर आणि मोर्शी शहरातील माध्यमस्नेही उपस्थित होते.
काँग्रेसने शहर आणि जिल्हा स्तरावर नवीन पदाधिकारी निवडण्यासाठी 'संघटन सृजन अभियान' सुरू केले आहे. या अभियानांतर्गत चांदूरबाजार आणि तिवसा येथे काँग्रेसच्या सभा पार पडल्या. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते आफताब अहमद आणि प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी आमदार भाई जगताप यांनी निरीक्षक म्हणून या सभांना उपस्थिती लावली. निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. शहर आणि जिल्ह्याच्या नेतृत्वासाठी कोण योग्य आहे, याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच, काँग्रेसला गावपातळीवर मजबूत करण्यासाठी जनतेत कोणते मुद्दे घेऊन जावे, यावर मार्गदर्शन करण्यात आले. अचलपूर विधानसभा मतदारसंघातील चांदूरबाजार येथे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय दुबे, संजय खाडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, महिला काँग्रेसच्या कांचनमाला गावंडे, वासंतीताई मंगरोळे, अता शाह, नामदेवराव तनपुरे, किशोर देशमुख, श्रीकांत झोडपे, राहुल गवई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निष्ठावान काँग्रेस समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संघटनेला अधिक बळकट करण्यावर आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यपद्धती गतिमान करण्यावर भर देण्यात आला. बबलू देशमुख यांनी यावेळी सांगितले की, संघटन सृजन अभियानामुळे पक्षाची पाळेमुळे अधिक मजबूत होत आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला जोडून काँग्रेसला पुन्हा जनतेच्या केंद्रस्थानी आणण्याचा आमचा निर्धार आहे. तिवसा येथेही निरीक्षक आफताब अहमद, आमदार भाई जगताप, माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, प्रदेश सरचिटणीस संजय दुबे आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत आढावा बैठक व कार्यकर्त्यांच्या मुलाखती पार पडल्या. तिवसा तालुका काँग्रेस आणि शहर काँग्रेसने या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत वैभव वानखडे यांच्या पुनर्निवडीचा ठराव मांडण्यात आला आणि कडक ऊन असतानाही ग्रामीण भागातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली.
वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अमरावतीकरांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. घर, फ्लॅट, प्लॉट, शेती, दागिने, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. सध्याची भाववाढ आणि इतर बाबींचा खरेदीवर कोणताही परिणाम झाला नसून, उलट गतवर्षीच्या तुलनेत विक्रीत वाढ झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. या शुभमुहूर्तावर शहरातील सुमारे ६० कुटुंबे नव्या घरात प्रवेश करणार आहेत. काही नागरिकांनी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून, तर काहींनी गरजेपोटी सोने-चांदी आणि डायमंड ज्वेलरीला पसंती दिली. घर, फ्लॅट, प्लॉट आणि शेतीच्या बाबतीतही अशीच स्थिती होती. आजची खरेदी म्हणजे भविष्यातील फायदा, असे अनेक खरेदीदारांचे मत होते. अमरावती महानगरात चारचाकी वाहनांपासून ते गृहपयोगी वस्तूंचे सर्व नामांकित ब्रँड्स उपलब्ध असल्याने ग्राहकांचा ओढा शोरूम्सकडे होता. क्रेडाई, अमरावतीचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि त्याला मुहूर्ताची जोड दिली जाते. गेल्या महिनाभरात सुमारे १२० नागरिकांनी घरांसाठी बुकिंग केले. यापैकी निम्म्या खरेदीदारांनी व्यवहार पूर्ण केले असून, ते अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करणार आहेत. तर साधारणतः तेवढ्याच नागरिकांनी उद्याच्या मुहूर्तावर व्यवहार पूर्ण करण्याचे ठरवले आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीबद्दल बोलताना दूरदर्शन (इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दालन) चे संचालक निलेश साबू म्हणाले की, गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि एसीला ग्राहकांनी पसंती दिली आहे. नव्या घरांसाठी नव्या वस्तू लागतात म्हणूनही नागरिकांनी खरेदी केली. बुकिंगमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ८ ते १० टक्के वाढ झाली आहे. पीएनजी, अमरावतीचे सेल्स हेड बापूसाहेब कारवाड यांनी सांगितले की, अक्षय्य तृतीया हा शुभमुहूर्त असल्याने सोन्याचे दागिने आणि डायमंड ज्वेलरीला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली. सोने हे अलीकडच्या काळातील सुरक्षित गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरले आहे.
अमरावती शहराच्या विकासासाठी पाणी, शिक्षण आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर भर देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. अमरावतीकरांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. महापालिकेच्या आढावा बैठकीत त्यांनी पुढील पाच वर्षांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. शनिवारी दुपारी झालेल्या या बैठकीत अमरावती शहराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या आढावा सभेला अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके, बडनेराचे आमदार रवि राणा, विधान परिषद सदस्य संजय खोडके व धीरज लिंगाडे यांच्यासह माजी पालकमंत्री प्रवीण पोटे आणि पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी शहरातील बेघर नागरिकांना प्राधान्य देत घरांचे पट्टे (हक्कपत्रे) वाटप करण्याचे निर्देश दिले. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, अशा नागरिकांची यादी तयार करून त्यांना विविध गृहनिर्माण योजनांद्वारे घरे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी, असेही ते म्हणाले. पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी जलविस्तार योजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून शहरातील सर्व भागांमध्ये नियमित व शुद्ध पाणीपुरवठा होईल. रस्ते, नाले, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत गरजांवर प्राधान्याने काम करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले. ऊर्जाबचत आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शहरातील पथदिवे सौरऊर्जेवर चालविण्याची सूचना करण्यात आली. तसेच, मनपाच्या शाळा, दवाखाने आणि प्रशासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शहरातील अतिक्रमणे हटवून सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर, लघु व्यावसायिकांसाठी स्वतंत्र हॉकर्स झोन तयार करून त्यांना नियोजित जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, गटनेता डॉ. राजेंद्र तायडे, गटनेता नाना आमले, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, उपसभापती सुमती ढोके, शिक्षण समिती सभापती अॅड. प्रीती रेवणे, महिला बाल कल्याण समिती सभापती ममता आवारे, उपसभापती लता देशमुख, विधी समिती उपसभापती डॉ. मधुरा काहाळे, आयुक्त वर्षा लड्डा, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, नगरसेवक आणि विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसभा महिला आरक्षण कायद्यातील दुरुस्ती आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी केंद्र सरकारने मांडलेले विधेयक बहुमताअभावी नामंजूर झाले असतानाच, सरकारने रात्रीतून अधिसूचना काढून 2023 चा कायदा लागू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या या घाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नेमके काय साध्य करायचे होते? असा सवाल करत केंद्र सरकारला धारेवर धरले. मात्र, राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली असून, राज ठाकरेंना या विषयातील नेमके काय कळते, अशी विचारणा करत त्यांची खिल्ली उडवली आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली असून राज ठाकरेंवरही त्यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, राज ठाकरे यांना अनुसूचित जाती, जमातींचे खासदार वाढू द्यायचे नाहीत. राज ठाकरे हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत. त्यांना काही समजत नाही, अशी टीका सदवार्ते यांनी केली आहे. पुढे बोलताना ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, राज ठाकरे यांना एससी, एसटी समाजाचे आमदार, खासदार नको आहेत. राज ठाकरे यांचा हाच वैचारिक डीएनए आहे. राज ठाकरे हे ओबीसींचे विरोधक आहेत. तसेच राज ठाकरे यांचे सर्व उद्योग हे महापालिका, टेंडरशी संबंधित आहेत. परंतु, राज ठाकरे हे संविधानाला चुकीचे दर्शवत आहेत. त्यांचे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा सदवार्ते यांनी दिला आहे.
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी प्रतिपादन केले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा भारतीय मातीतील असल्याने तो जनमानसात रुजला आहे, तर मार्क्सवादी विचार आयात केलेला असल्याने आणि कालबाह्य झाल्याने तो संपला आहे. 'मला उमगलेला संघ' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.पुण्यातील टिळक रस्त्यावरील लेडी रमाबाई सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ संगीतकार राहुल रानडे, प्रसिद्ध अभिनेते ऋषिकेश जोशी, पुस्तकाचे संपादक सुधीर जोगळेकर आणि 'भारतीय विचार साधना' (भाविसा) संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे व्यासपीठावर उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार भगवान दातार यांनी तोरसेकर यांच्याशी संवाद साधला. संघाने १०० वर्षे पूर्ण केली असताना कम्युनिस्ट चळवळ का लयाला गेली, याचा उलगडा करताना तोरसेकर म्हणाले की, कम्युनिस्टांना आता भारताची मातीही मान्य नाही. सुरुवातीच्या काळात काही नेत्यांनी प्रयत्न केले असले तरी, आता ही संपूर्ण चळवळ केवळ 'पुस्तकी' राहिली आहे. याउलट, संघ स्वयंसेवक समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहेत आणि संघ केवळ ज्ञानी लोकच नव्हे, तर समाजासाठी उपयुक्त ठरणारे लोकसंग्राहक स्वयंसेवक निर्माण करतो. अभिनेते ऋषिकेश जोशी यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, नाट्यकलेचा अभ्यास करताना २० वर्षे ते डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली होते. मात्र, जगभरातील संस्कृती नष्ट होत असताना भारताची संस्कृती का टिकली, याचा अभ्यास केल्यावर त्यांना संघ कार्यामागील बलस्थाने लक्षात आली. राष्ट्रभक्तीचा समान धागा त्यांना संघाकडे आकर्षित करणारा ठरला. ज्येष्ठ संगीतकार राहुल रानडे म्हणाले की, संघाच्या शिस्तप्रियतेमुळेच ही संघटना १०० वर्षे टिकली आहे. संघ प्रार्थनेचे लंडनच्या 'रॉयल ऑर्केस्ट्रा'मध्ये ५७ वादकांसह ध्वनिमुद्रण करणे, हा एक प्रकारे 'काव्यगत न्याय' असल्याचे त्यांनी नमूद केले.अॅड. क्षितीज गायकवाड यांनी सांगितले की, बौद्ध समाजात जन्म झाल्यामुळे सुरुवातीला त्यांच्या मनात संघाविषयी चुकीची मते होती. मात्र, गिरीश प्रभुणे यांच्या सानिध्यात आल्यावर त्यांना खरा संघ उमजला. 'भारतीय विचार साधना' संस्थेने आतापर्यंत ६०० पुस्तकांचे प्रकाशन केले असून, समाजातील मान्यवरांची संघाविषयीची मते संकलित करण्याच्या उद्देशातून 'मला उमगलेला संघ' या पुस्तकाची निर्मिती करण्यात आल्याचे संपादक सुधीर जोगळेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी तोरसेकर यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले की, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर वंचितांसाठी लढा दिला. ते कधीही 'डावे' नव्हते. ते आज हयात असते, तर नक्कीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठीशी उभे राहिले असते. दुर्दैवाने आजच्या चळवळीतील लोकांनी या महापुरुषांना नीट वाचलेले नाही, असेही त्यांनी नमूद केले.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगली येथील एका कार्यक्रमात आपल्या तारुण्यातील एक रंजक आणि मजेशीर किस्सा सांगितला. वयाच्या विसाव्या वर्षी पत्नीसोबत चित्रपट पाहायला गेले असताना, पत्नी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. ती आपली पत्नी असल्याचे सांगूनही पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि मुलगी पळवून नेल्याच्या संशयावरून आपल्याला चक्क तुरुंगात जावे लागले असल्याचा एक किस्सा बावनकुळे यांनी यावेळी सांगितली. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी 20 वर्षांचा असताना पत्नीसोबत चित्रपट पाहायला गेलो होतो. तेव्हा माझी पत्नी अल्पवयीन होती. चित्रपटगृहातून बाहेर आल्यावर पोलिसांनी आम्हाला पकडले. माझी पत्नी त्यावेळी अल्पवयीन असल्यामुळे तिने सांगून देखील माझ्यावर मुलगी पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाला आणि मला पोलिसांनी तुरुंगात टाकले, असा मजेशीर किस्सा त्यांनी सांगितला. तसेच तब्बल दीड वर्ष ही केस सुरू होती आणि मी 8 दिवस जेलमध्ये असल्याचे देखील बावनकुळे यांनी सांगितले. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचे प्रेम जुळले तेव्हा पत्नी 16 वर्षांची होती आणि मी 20 वर्षांचा होतो. आम्ही दोघेही अल्पवयीन होतो. त्यावेळी आम्ही कयामत से कयामत चित्रपट पाहायला गेलो होतो. चित्रपट पाहून बाहेर आल्यावर पोलिसांनी आम्हाला पकडले. आम्ही दोघेही छोटे होतो. पण आम्हाला कोणालाच काही सांगता येत नव्हते. काही कारण नसताना पोलिस मला पोलिस स्टेशनला घेऊन गेले. अल्पवयीन मुलगी पळवून नेली म्हणून माझ्यावर केस लावली, असे त्यांनी सांगितले. हा किस्सा ऐकल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची १६८ वी जयंती महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित 'महर्षी कर्वे व्याख्यानमाले'त जनकल्याण रक्तकेंद्र, पुणे चे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी 'थॅलेसेमिया' या रक्तविकारावर मार्गदर्शन केले. थॅलेसेमियाचे आव्हान पेलण्यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. दिवसभरात संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्वे रस्त्यावरील महर्षी कर्वे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी व्हिजन इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी घोषपथकाद्वारे पुतळ्यास मानवंदना दिली. 'आव्हान रक्तविकारांचे' या विषयांतर्गत डॉ. अतुल कुलकर्णी यांचे विशेष व्याख्यान संस्थेच्या रमा-पुरुषोत्तम विद्या संकुलात पार पडले. या व्याख्यानात त्यांनी थॅलेसेमिया या घातक रक्तविकाराविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव, व्यवस्थापक मंडळ सदस्य मंदार पारखी, सीमा कांबळे, वित्त समिती अध्यक्ष सीए अभय कुलकर्णी, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, उपसचिव कांचन सातपुते हे मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थिनी, विविध शाखांचे शाखाप्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने प्रत्यक्ष तसेच युट्यूब लिंकद्वारे आभासी स्वरुपातही सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात डॉ. न. म. जोशी लिखित 'भारतरत्न महर्षी कर्वे' या मराठी पुस्तकाचा श्रीमती विनया बापट यांनी केलेला इंग्रजी अनुवाद मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. संस्थेच्या वतीने विनया बापट आणि डॉ. न. म. जोशी यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर दोघांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. अतुल कुलकर्णी यांनी मानवी देहाला निसर्गाची उत्कृष्ट निर्मिती संबोधत, रक्त हा त्यातील अलौकिक घटक असल्याचे सांगितले. शरीरातील सर्व इंद्रियांपर्यंत ऑक्सिजन पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रक्तपेशी करतात. मात्र, त्यात विकार उत्पन्न झाल्यास शरीराच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. थॅलेसेमिया हा असाच एक अनुवांशिक रक्तविकार आहे. रक्तातील लाल रक्तपेशी योग्य पद्धतीने तयार न होणे हे या विकाराचे मुख्य लक्षण आहे. सर्व शारीरिक गुणधर्म गुणसूत्रातून संक्रमित होतात, त्याचप्रमाणे काही विकारही संक्रमित होतात. आई आणि वडील दोघेही थॅलेसेमियाचे वाहक असल्यास पुढच्या पिढीत हा विकार उद्भवू शकतो, असे त्यांनी सांगितले. आज महाराष्ट्रात १५०० पेक्षा अधिक मुलांना या विकारामुळे नियमित रक्त भरून घ्यावे लागते. एका थॅलेसेमियाग्रस्त मुलास दर वर्षी १० ते १५ रक्तपिशव्यांची आवश्यकता असते. या मुलांवर उपचार करण्यासोबतच थॅलेसेमिया उद्भवूच नये यासाठी व्यापक जनजागरणाची नितांत आवश्यकता असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी अधोरेखित केले.
पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य व्हेटरन्स टेबल टेनिस समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 32व्या राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 24 एप्रिल ते 4 मे 2026 या कालावधीत म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण 5 लाख 98 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष राजीव बोडस आणि पीडीटीटीएच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधून खेळाडूंनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये वैयक्तिक गटात 1195, सांघिक गटात 197 आणि दुहेरी गटात 834 खेळाडूंचा समावेश असून, याला विक्रमी प्रतिसाद लाभला आहे. केवळ महाराष्ट्रातून 300 हून अधिक वैयक्तिक प्रवेशिका आल्या असून, 30 संघ आणि 166 दुहेरी जोड्या राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यावेळी प्रकाश तुळपुळे (टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ सचिव), महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी यतीन टिपणीस आणि स्पर्धा संयोजन सचिव आशिष बोडस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शारदा ग्रुप आणि डेक्कन डाईज व केमिकल इंडस्ट्रीज यांनी या स्पर्धेला प्रायोजकत्व दिले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचे स्टार खेळाडू मनीषा बोडस, वीणा जोशी, रंजना पत्की, सुशमा मोघरे, शिल्पा जोशी, राधिका दोरले, मयुरी दीक्षित तसेच पुरुष गटात सुबोध देशपांडे, सूरज चंद्रशेखरन, केदार कसबेकर, मनीष रावत, प्रसाद नाईक यांसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंचे कौशल्य पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75 वर्षांवरील आणि 75 वर्षापुढील पुरुष व महिला अशा विविध वयोगटात सांघिक, एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकारात खेळवली जाईल. स्पर्धेसाठी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात 16 नवीन 'स्टॅग' टेबल टेनिस टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सामने होतील. स्पर्धेतील विजेत्यांना पदके, करंडक आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.
एमक्युर फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका नमिता थापर यांनी म्हटले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आरोग्यसेवेत मानवी स्पर्श अधिक मजबूत करेल. 'सिमहेल्थ २०२६' या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात बोलताना, त्यांनी भारताच्या आरोग्यसेवेचा प्रवास 'सुविधांच्या अभावाकडून' 'उद्देश्यपूर्ण काळजीकडे' वळला पाहिजे, असे मत व्यक्त केले. थापर यांच्या मते, एआय आरोग्यसेवा व्यावसायिकांना पुनरावृत्तीच्या कामांमधून मुक्त करून रुग्णांशी अर्थपूर्ण संवाद साधण्यास मदत करू शकते. त्यांनी पर्यायी उपचारपद्धतींचा समावेश आणि महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यावर भर दिला, जे सर्वसमावेशक आणि भविष्याभिमुख आरोग्य व्यवस्थेसाठी आवश्यक आहे. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) अंतर्गत वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेने १७ व १८ एप्रिल २०२६ रोजी ‘सिमहेल्थ २०२६’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. 'स्मार्ट आरोग्यसेवेचा स्वीकार: भाकीत-आधारित, अचूक आणि वैयक्तिकृत आरोग्य प्रणाली' या संकल्पनेवर आधारित ही परिषद सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे कॅम्पसमध्ये पार पडली. आरोग्यसेवा, तंत्रज्ञान आणि सार्वजनिक धोरणावर आधारित ही 'सिमहेल्थ' परिषदेचे हे २७ वे वर्ष होते. देशातील अग्रगण्य शैक्षणिक परिषदांपैकी एक म्हणून हिने विशेष स्थान निर्माण केले आहे. यंदाच्या परिषदेत चिकित्सक, संशोधक, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, आयटी नवोन्मेषक आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसह १ हजार ४०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. आरोग्यसेवेच्या भविष्यावर भाष्य करताना, नमिता थापर यांनी भारताच्या 'थ्री ए' (उपलब्धता, जागरूकता आणि परवडणारी किंमत) कडे लक्ष देण्याच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यायी उपचार पद्धती आणि महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणाऱ्या भविष्यवेधी दृष्टिकोनाचे समर्थन केले. थापर यांनी स्पष्ट केले की, एआय निदान, क्लिनिकल चाचण्या आणि दुर्गम भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. यामुळे आरोग्यसेवा तज्ज्ञांना सहानुभूती आणि वैयक्तिकृत काळजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. त्यांनी आधुनिक वैद्यकशास्त्रासोबत आयुर्वेद, पोषण आणि निसर्गोपचार पद्धतींच्या एकात्मिकरणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि महिलांच्या आरोग्यासाठी अधिक जागरूकता, संशोधन आणि गुंतवणुकीचे आवाहन केले. परिषदेच्या समारोप समारंभास नमिता थापर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी डॉ. राजीव येरवडेकर (प्रोव्होस्ट, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखा), डॉ. विद्या येरवडेकर (प्रधान संचालिका, सिंबायोसिस व प्र-कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ) आणि डॉ. आर. रमण (कुलगुरू, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ) आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यात 'लेक लाडकी' योजनेअंतर्गत ९ हजार ४८२ मुलींना लाभ मिळाला आहे. १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या या मुलींना मागील तीन वर्षांत ४ कोटी ७४ लाख १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ही माहिती दिली. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. योजनेच्या पहिल्या हप्त्यांतर्गत प्रत्येक लाभार्थीला ५ हजार रुपये दिले जातात. २०२३-२४ मध्ये १ हजार ४० मुलींना ७० लाख रुपये, २०२४-२५ मध्ये ५ हजार ७२० मुलींना २ कोटी ८६ लाख रुपये आणि २०२५-२६ मध्ये २ हजार ३६२ मुलींना १ कोटी १८ लाख १० हजार रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. 'लेक लाडकी' योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाला चालना देणे, मृत्यूदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे हा आहे. याशिवाय, कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठीही ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. या योजनेसाठी काही अटी व शर्ती आहेत. लाभार्थी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असावे, त्यांचे बँकेत खाते असावे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. ही योजना १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील एक किंवा दोन मुलींसाठी लागू आहे. जर कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल, तर मुलीला या योजनेचा लाभ मिळतो. योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, इयत्ता सातवीत ७ हजार रुपये, इयत्ता अकरावीत ८ हजार रुपये आणि मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये असे एकूण १ लाख १ हजार रुपयांचा लाभ दिला जातो. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि बालकल्याण सभापती अंकिता पाटील यांनी जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाण संतुलित राखण्यासाठी उपाययोजना करण्यासोबतच महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी योजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) आनंद खंडागळे यांनी ही माहिती दिली.
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन:पत्रकारितेतील लढवय्या आधारवड हरपल्याची भावना
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांच्या निधनाने पत्रकारितेतील एक लढवय्या, संघटक आणि अनेकांसाठी आधारवड ठरलेले नेतृत्व हरपल्याची भावना विविध क्षेत्रांतील ज्येष्ठांनी व्यक्त केली आहे. उपस्थित मान्यवरांनी कै. भोईटे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कै. प्रकाश भोईटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पत्रकार भवन येथे शनिवारी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. भोईटे हे पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष होते. या सभेला पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलीप तायडे, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, कार्यवाह पांडुरंग सांडभोर, तसेच ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, कल्पना खरे, राजेंद्र पाटील, मंगेश कोळपकर, जयराम देसाई, मारुती जोशी, मोरेश्वर जोशी, नंदकुमार काकीर्डे, दिगंबर दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, प्रदीप पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, विद्याधर अनस्कर, भाजपचे ज्येष्ठ नेते योगेश गोगावले, माजी पोलिस सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे, मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, प्रविण गायकवाड, बाळासाहेब दाबेकर, संगीता तिवारी, जिल्हा परिषदेचे आशिष जराड, प्रताप भोईटे, संदीप जगताप यांच्यासह विविध वृत्तपत्रांतील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय, राजकीय आणि अन्य क्षेत्रांतील अनेक ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शैलेश काळे यांनी सांगितले की, पत्रकारांच्या हक्कांसाठी कायम लढणारा, निर्भीड आणि स्पष्टवक्ता हरपल्याने पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे. राजीव साबडे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, पत्रकार संघाच्या उभारणीपासून ते इमारत, सभागृह, रस्ता अशा पायाभूत सुविधांसाठी प्रकाश भोईटे यांचे मोठे योगदान होते. पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात त्यांनी दिलेला लढा, संघटित शक्तीवर ठेवलेला विश्वास आणि पत्रकार कुटुंबासाठी घेतलेली जबाबदारी हे त्यांचे कार्य मोठे आहे. त्यांनी पत्रकार संघटना बळकट करण्यासाठी आपले आयुष्य झोकून दिले होते. अंकुश काकडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, भोईटे यांनी ग्रामीण भागातील निर्भीड आणि स्पष्टवक्ते पत्रकार म्हणून काम केले. त्यांनी जिल्हा परिषदेच्या चांगल्या कारभाराबरोबरच भ्रष्ट कारभारदेखील पुढे आणला, असे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये मागील काही आठवड्यात अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान देखील झाले. त्यानंतर पुन्हा कडक उन्ह तसेच गर्मीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. उन्ह इतके वाढले की अकोल्यात उष्माघातामुळे एका रिक्षा चलकाचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली होती. मात्र, आता पुन्हा राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत माहिती दिली की, राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत. तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई-बंगळुरू मार्गावर मालवाहू टेम्पोला आग:परदेशी फर्निचर जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही
पुण्यातील मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे परिसरात एका मालवाहू टेम्पोला आग लागल्याची घटना शनिवारी घडली. या आगीत टेम्पोसह त्यातील परदेशी बनावटीचे महागडे फर्निचर जळून खाक झाले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शनिवारी बाह्यवळण मार्गावरून जात असताना, वारजे पुलाजवळील सेवा रस्त्यावर टेम्पोने अचानक पेट घेतला. टेम्पोमध्ये परदेशी बनावटीचे फर्निचर होते. आग लागल्याचे लक्षात येताच, चालकाने प्रसंगावधान राखत टेम्पो बाजूला घेतला आणि स्वतः बाहेर पडल्याने तो बचावला. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान रमेश भिलारे, धर्मराज माने, नीलेश तांगुदे, सिद्धेश भगत, प्रतीक पांगसे आणि दत्ताराय शेटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या जवानांनी चालकाची चौकशी केली असता, तो मुंबईहून परदेशी बनावटीचे फर्निचर घेऊन पुण्यात येत असल्याची माहिती त्याने दिली. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यात मध्यभागात वाहतूक बदल - छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीस बंद अक्षय तृतीयेनिमित्त रविवारी (१९ एप्रिल) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मध्यभागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. ‘अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. रविवारी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात करण्यात आले आहे. भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त दुचाकी फेरी मध्यभागातून काढण्यात येणार आहे. भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन रविवारी सकाळपासून मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे. ‘गर्दी ओसरेपर्यंत मध्यभागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि परिसरातील रस्त्यांवर वाहतूक बदल करण्यात येणा आहे. अत्यावश्यक सेवावगळता पीएमपी बस, तसेच अन्य वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे’, असे त्यांनी नमूद केले.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एका गृहिणीने किरकोळ कारणावरून आलेल्या रागातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 'मटण नीट शिजले नाही' या शुल्लक कारणावरून पतीशी झालेल्या वादाने चेतना मनोज जाधव या महिलेने विष प्राशन करून आपले जीवन संपवले. एका हसत्याखेळत्या संसाराची या घटनेमुळे राखरांगोळी झाली असून, संतापाच्या भरात घेतलेल्या एका निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेच्या दिवशी पती मनोज जाधव याने एका मित्राला जेवणासाठी घरी बोलावले होते. मटण व्यवस्थित शिजले नसल्याचे कारण पुढे करत मनोजने पाहुण्यासमोरच चेतनाचा अपमान करण्यास सुरुवात केली. हा वाद केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित न राहता, त्यात मनोजचा संशयी स्वभाव आणि व्यसनाचीही भर पडली. या सार्वजनिक अपमान आणि सततच्या जाचाला कंटाळून चेतनाने टोकाचे पाऊल उचलले. भरलेल्या ताटावरून उठली अन्... घटनेच्या दिवशी पाहुण्यांसमोरच झालेल्या अपमानामुळे चेतना भरल्या ताटावरून उठून आत गेली आणि तिने विषारी औषध प्राशन केले. बाहेर येऊन तिने ही बाब आपल्या पतीला सांगितली तेव्हा एकच खळबळ उडाली. ही घटना घडल्यानंतर चेतनाला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. चेतनाने यापूर्वी मनोजला केले होते माफ दरम्यान, मनोजला दारूचे व्यसन होते. यापूर्वी देखील 2015 साली त्याच्यावर कौटुंबिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. 2017 मध्ये 'पुन्हा सुखाने संसार करू' या अटीवर चेतनाने मनोजला माफ केले होते. मात्र बुधवारी घडलेल्या घटनेतून झालेल्या अपमानाचा घाव चेतनाच्या जिव्हारी लागला आणि त्यातून तिने टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल या दुर्दैवी घटनेप्रकरणी मृत चेतनाचे मामा मनोहर राठोड (रा. देवगाव) यांच्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी पती मनोज जाधव याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, चेतनाच्या मृत्यूनंतर आर्णी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती, जिथे त्यांचा आक्रोश काळजाला पिळवटून टाकणारा होता. सध्या पोलिस शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत असून, पोलिस उपनिरीक्षक पल्लवी निनगूरकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
महिला आरक्षण विधेयकावरून कॉंग्रेस पक्षाने माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपण कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही. परंतु, कॉंग्रेसने महिला आरक्षण विधेयकामध्ये खोडा घालण्याचे कारण नव्हते, असे चव्हाण यांनी म्हटले. तसेच लोकसभेचे मतदारसंघ अवाढव्य झाले आहेत. ते आता सुटसुटीत केले पाहिजेत यात गैर काय? मतदारसंघात समानता आणली पाहिजे, असेही चव्हाण यांनी म्हटले. अशोक चव्हाण म्हणाले की, मला मान्य आहे की कॉंग्रेसच्या काळात महिलांना आरक्षण द्यायचा निर्णय झाला, ते कोणी नाकारत नाही. पण आता जे महाभाग माझ्यावर टीका करतात, त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की माझी टीका वैतक्तीक नाही. महिला आरक्षणाच्या विधेयकात काल विनाकारण विरोधकांनी खोडा घातला. त्याचे काहीही कारण नव्हते. निर्णयाचे श्रेय मोदी सरकारला नको म्हणून अडवणूक पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, अमित शहा यांनी प्रत्येक प्रश्नावर स्पष्टीकरण दिले आहे. विरोधकांनी सांगितलेल्या सुधारणा करायलाही ते तयार होते. सरकारची सगळी राजकीय तयारी केली, सर्व स्पष्ट केले. मतदारसंघ पुनर्रचनेततून दक्षिण भारतातील जागा कमी होत नाहीत हे स्पष्ट केले. मग त्याला दोन तृतीयांश बहुमताने पास करण्यासंदर्भात विरोधकांच्या मदतीची आवश्यकता होती. महिला आरक्षणाचा महत्त्वाचा भाग होता. पण निर्णयाचे श्रेय मोदी सरकारला नको म्हणून अडवणूक केली, असे चव्हाण यांनी म्हटले. कॉंग्रेसकडे केडर शिल्लक नाही अनेक राज्यांत कॉंग्रेसची 20-20 वर्षे झाली, तरी सरकार नाहीत. अनेक राज्यात कॉंग्रेसकडे खाली केडर शिल्लक नाही. महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे. केंद्रीय नेतृत्वाला यांच्याशी काही घेणदेणे नाही. कॉंग्रेसला काहीही भवितव्य नाही, त्यामुळे त्यांच्यातील अनेक नेते हे भाजपमध्ये यायाला तयार असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, मी भाजपमध्ये असलो तरीही कॉंग्रेसच्या विरोधात मुद्यांवर बोलतो. सरकारने घेतलेले निर्णय योग्यच आहेत, कॉंग्रेसकडे काही मुद्दाच राहिला नाही. मी कॉंग्रेस सोडल्यामुळे काही लोकांना चांगले वाटते, कारण मी गेल्याने त्यांना संधी मिळाली. काही लोक खासगीमध्ये सांगतात की भाजपमध्ये यायचे आहे. किती दिवस विरोधात राहायचे असे बोलतात. कॉंग्रेसची अशोक चव्हाण यांच्यावर टीका कॉंग्रेसने अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, ज्या कॉंग्रेस पक्षाशी आपले वडील स्व. शंकरराव चव्हाण साहेब आयुष्यभर एकनिष्ठ राहिलेत, त्याच कॉंग्रेस पक्षासोबत आपण गद्दारी करण्याअगोदर 2023 मध्येच नारी शक्ती वंदन अधिनियम 2023, म्हणजे लोकसभा व विधानसभेच्या जागांमध्ये महिलांसाठीचे 33 टक्के आरक्षण हे संसदेत एकमताने (कॉंग्रेसच्या पाठिंब्याने) मंजूर झालेले आहे. ते 16 एप्रिल 2026 पासून लागूही झाले आहे. पुढे कॉंग्रेसने म्हटले की, आपल्या माहितीसाठी, ज्यांच्यामुळे आपण पहिल्यांदा लोकसभेच्या सभागृहात निवडून गेलात त्या स्व. रंजीव गांधी यांनीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू केले व नंतर 50 टक्के आरक्षणही कॉंग्रेसच्याच काळात लागू करण्यात आले. खाल्लेल्या मिठाला जागायला शिका, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या, अशी खोचक टीका चव्हाण यांच्यावर कॉंग्रेसने केली होती.
पंतप्रधान मोदी आज रात्री देशाला करणार संबोधित
नवी दिल्ली : लोकसभेत काल नारीशक्ती वंदन अधिनियमासह १०३ वी घटना दुरुस्ती विधेयक दोन तृतीयांश बहुमताअभावी फेटाळले गेले, त्यामुळे भाजपप्रणित एनडीए सरकार बॅकफूटवर आले आहे. तर दुसरीकडं २०२३ मध्ये पारित केलेले महिला आरक्षण विधेयक सरकारने तात्काळ लागू करावें, त्याला आमचा शतप्रतिशत पाठींबा असल्याचं काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचे म्हणणेआहे. त्यामुळे आता आता भाजप कोंडीत सापडला असून देशातील […] The post पंतप्रधान मोदी आज रात्री देशाला करणार संबोधित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने नवनियुक्त मनपा आयुक्त अमोल येडगे आणि नवनियुक्त विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचा सत्कार व स्वागत समारंभ शनिवारी संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना महापौर समीर राजूरकर यांनी जी. श्रीकांत यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, पुरुषोत्तम भापकर यांनी २०१३ मध्ये शहराच्या डीपीवर काम सुरू केले होते, त्याचा कळस श्रीकांत यांनी रस्ते मोकळे करून चढवला. श्रीकांत हे प्रशासनातील 'युझर फ्रेंडली अँड्रॉइड फोन' सारखे होते, ज्यांनी नेहमी आपलेपणा जपला. अतिक्रमण कारवाईत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विश्वास दिला. कर्मचाऱ्यांचा विमा काढल्यामुळेच, अनधिकृत बॅनर काढताना अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला १.१० कोटींची मदत मिळू शकली. श्रीकांत यांनी नियम पाळताना नगरसेवक पतीवरही गुन्हे दाखल करण्यास मागेपुढे पाहिले नाही. महापौर राजूरकर यांनी आता अमोल येडगे यांनी हा विकासाचा पाया कळसापर्यंत न्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर नवनियुक्त आयुक्त अमोल येडगे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, प्रोबेशन काळापासून मला जी. श्रीकांत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांनी केलेल्या कामाची उंची अधिक वाढवण्याचे काम मी करेन. शहराच्या प्रगतीत आता १२५ माजी नगरसेवकांचा अनुभव सोबत असेल. पाणीपुरवठा विभागाच्या कामाला गती देऊन नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवण्यावर माझा भर असेल. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी अत्यंत भावूक होत आपल्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, लोक मला विचारायचे की किती दिवस मराठवाड्यात अडकून राहणार? पण या मातीचे माझ्यावर ऋण होते आणि ते फेडण्यासाठीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला ही जबाबदारी दिली. मनपा आयुक्त म्हणून आलो तेव्हा ईडी चौकशी सुरू होती, पण मी डगमगलो नाही. शहराला १० दिवसांनी पाणी मिळते याची मला लाज वाटत होती. आता विभागीय आयुक्त म्हणून प्रत्येक घराला पाणी देण्यासाठी मी बांधील आहे. पुढच्या तीन वर्षात शहराचा चेहरा बदलेल. अतिक्रमण काढताना कुणाची घरे तोडणे हा आनंद नव्हता, तर शहर मोकळे करणे हा उद्देश होता, असे श्रीकांत यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास आमदार संजय केनेकर, उप महापौर राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेते समीर बिल्डर, प्रभारी जिल्हाधिकारी संभाजीराव अडकूने, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, कल्पिता पिंपळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्लास्टिक कचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा:महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि बिसलेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या 'बॉटल्स फॉर चेंज' उपक्रमांतर्गत पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या बाकड्यांचे आणि कचरा संकलन डब्यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी महापौर रवी लांडगे यांनी प्लास्टिक कचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले. पिंपरी-चिंचवड शहराला पर्यावरणपूरक बनवण्यासाठी आणि प्लास्टिक कचरा समस्या सोडवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. पीसीएमसी कार्यालय परिसरात महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते या सुंदर बाकड्यांचे आणि कचरा संकलन डब्यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महापालिकेचे उपमहापालिका आयुक्त व आरोग्य विभाग प्रमुख डॉ. प्रदीप थेंगल, बिसलेरी इंटरनॅशनलचे सस्टेनेबिलिटी आणि कॉर्पोरेट अफेअर्स विभागाचे संचालक के. गणेश, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि सीएसआर सेलमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापौर लांडगे यांनी सांगितले की, बिसलेरीसोबतची ही भागीदारी कंपन्या आणि प्रशासन एकत्रितपणे काम करून शहरात सकारात्मक बदल घडवू शकतात, याचे उत्तम उदाहरण आहे. या उपक्रमामुळे शहरातील प्लास्टिक कचरा लँडफिलमध्ये न जाता त्याचा विधायक पुनर्वापर होईल, ज्यामुळे 'सर्क्युलर इकॉनॉमी'ला बळ मिळेल. बिसलेरीचे संचालक के. गणेश यांनी कचरा जिथे निर्माण होतो, तिथेच त्याचे वर्गीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. शैक्षणिक संस्था आणि जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून बिसलेरीने कचरा व्यवस्थापनाचा एक यशस्वी मार्ग दाखवला आहे. २०२५-२६ या वर्षात बिसलेरीने देशभरात ३०,३०९ मेट्रिक टन प्लास्टिक कचरा संकलित करून तो पुनर्वापरासाठी पाठवला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी पिंपरी-चिंचवडमधील ८ शैक्षणिक संस्थांना महापौरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या संस्थांनी वर्षभर आपल्या परिसरात प्लास्टिक कचरा संकलनाचे प्रभावी काम केले होते. डॉ. प्रदीप थेंगल यांनी 'बॉटल्स फॉर चेंज' सारखे उपक्रम शहराला शाश्वत विकासाकडे नेण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे म्हटले. हा उपक्रम बिसलेरीच्या 'ग्रीनर प्रॉमिस' मोहिमेचा भाग असून, याद्वारे शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि जलसंधारणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नागरी समितीला 'राम नदी सेवक सन्मान' प्रदान:कोहिनूर राम नदी महोत्सवाचा समारोप, पुनरुज्जीवनाचा निर्धार
पुणे येथे कोहिनूर कट्टा आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाचा शनिवारी समारोप झाला. या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (दि. १८) भूगाव येथील नागरी समस्या निवारण समितीला उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते 'राम नदी सेवक सन्मान' प्रदान करण्यात आला. यावेळी राम नदीच्या पुनरुज्जीवनाचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यावेळी उपस्थित होते. अनिल निवृत्ती करंजावणे, पंढरीनाथ शिवराम शेडगे आणि शिवाजी काशीनाथ रणवरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी हा पुरस्कार स्वीकारला. पत्रकार भवन येथे आयोजित या महोत्सवाला महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी राम नदीचे प्रदूषण त्वरित थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, प्रदूषण, राडारोडा, अतिक्रमण, सांडपाणी आणि प्लास्टिक कचरा अशा अनेक समस्यांनी राम नदी वेढलेली आहे. गोयल यांनी विश्वास व्यक्त केला की, सर्व स्तरातील नागरिक, युवा पिढी आणि सामाजिक संस्थांनी सहकार्य केल्यास ही परिस्थिती बदलता येईल. या महोत्सवातून राम नदीवर आधारित लघुपट आणि पर्यावरण तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. चित्रपट हा समाजजीवनाचा आरसा असून, या महोत्सवाद्वारे नदीचे वास्तव मांडले गेले. केवळ महोत्सव करून न थांबता, नदी स्वच्छ, सुंदर आणि अविरल ठेवण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असेही त्यांनी सांगितले. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी सांगितले की, मातेसमान नद्यांची अवहेलना होऊ नये, ही जागृती या महोत्सवाद्वारे झाली आहे. भविष्यात राम नदीसंदर्भात विविध सामाजिक संस्था आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून 'राम नदी संसद' आयोजित करण्याचा मानस आहे. तसेच, दर महिन्याला 'राम नदी परिक्रमा' आयोजित करून नदीची ओळख करून दिली जाईल आणि लहान-मोठ्या उपक्रमांतून नदीची शुद्धता टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातील. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अनिल करंजावणे म्हणाले की, राम नदी परिक्रमा करताना निर्मळ नदी अशुद्ध झाल्याचे पाहून खूप दुःख झाले. मानवनिर्मित प्रदूषणाला आळा घालण्यासाठी त्यांनी नदी स्वच्छता अभियान सुरू केले. 'देशाचे देणे लागतो' या भूमिकेतून ते अविरतपणे कार्यरत आहेत. हा पुरस्कार पुढील कार्यासाठी प्रोत्साहन देईल, असेही त्यांनी नमूद केले.
अहद युसुफ शेख बनला तरोड्यातील पहिला एमबीबीएस डॉक्टर
परभणी : तालुक्यातील तरोडा गावातील युवक अहद युसुफ शेख याने वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित एमबीबीएस पदवी यशस्वीपणे प्राप्त केली आहे. त्याचे हे यश गावासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. विशेष म्हणजे तरोडा गावातून एमबीबीएस शिक्षण पूर्ण करणारा तो पहिलाच विद्यार्थी ठरला असून त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिद्द, मेहनत […] The post अहद युसुफ शेख बनला तरोड्यातील पहिला एमबीबीएस डॉक्टर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
व्हॉईस ऑफ मीडियाची परभणी जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध जाहीर
परभणी : पत्रकारांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम (व्हीओएम) या आंतरराष्ट्रीय संघटनेची परभणी जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षपदी कैलास चव्हाण यांची तर सह सरचिटणीसपदी सुधीर बोर्डे यांची निवड करण्यात आली आहे. अवघ्या ५ वर्षात जगातील तब्बल ७८ देशात विस्तारलेल्या या संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी राज्याचे […] The post व्हॉईस ऑफ मीडियाची परभणी जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध जाहीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धुराचे लोट अन् आगीचे तांडव!:JNPA जवळ भीषण आग; उरणमधील गव्हान फाटा येथे कंटेनर यार्ड जळून खाक
मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (JNPA) जवळ, उरण येथील गव्हान फाटा येथे एका माल हाताळणी गोदामात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर यार्डमधील एका शेडमध्ये ही आग लागली, त्यानंतर आग पसरल्याने अनेक कंटेनर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दृश्यांमध्ये कंटेनर यार्डच्या वर धुराचा प्रचंड लोट दिसत असून, तो दूरवरूनही स्पष्ट दिसत आहे. पनवेलहून अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आग विझवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहे. ही बातमी आम्ही अपडेट करत आहोत दरम्यान, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 येथे किरकोळ आग लागली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, मुंबई अग्निशमन दलाचे जवान, पोलिस आणि प्रभाग कर्मचाऱ्यांना आग लागलेल्या ठिकाणी त्वरित तैनात करण्यात आले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
हवाई सेवा हळूहळू पूर्ववत : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
पुणे : पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाशी संबंधित घटनेनंतर धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली होती. शुक्रवारी (१७ एप्रिल) रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास लँडिंग करताना एका लढाऊ विमानाचे लँडिंग गिअर निकामी झाल्यामुळे धावपट्टीवर अडथळा निर्माण झाला. सुदैवाने, विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही. या घटनेनंतर धावपट्टी मोकळी करून दुरुस्तीचे […] The post हवाई सेवा हळूहळू पूर्ववत : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘राजा शिवाजी’ सिनेमातून अतुल गोगावले यांच्या लेकाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण
मुंबई : प्रतिनिधी सध्या रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाची खूप उत्सुकता आहे. या सिनेमात संगीतकार अजय-अतुल या जोडीपैकी अतुल गोगावलेंचा लेक रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या गाण्यात अतुल गोगावलेंचा लेक आर्य गोगावलेची झलक बघायला मिळाली. ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं जे अँथम साँग रिलीज झालं त्यात आर्य बघायला मिळाला. अतुल गोगावले यांनी सोशल […] The post ‘राजा शिवाजी’ सिनेमातून अतुल गोगावले यांच्या लेकाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिला आरक्षण कायदा २०२३ मध्ये संसदेत मंजूर
मुंबई : प्रतिनिधी महिला आरक्षण कायदा २०२३ मध्येच मंजूर झाला असताना, आता मतदारसंघांची फेररचना करण्याचा घाट कशासाठी? असा सवाल करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे. विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे लोकशाहीविरोधी विधेयक पराभूत झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाने दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभेत महिला आरक्षण बिलाच्या विरोधात […] The post महिला आरक्षण कायदा २०२३ मध्ये संसदेत मंजूर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकमध्ये लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढतच असल्याचे दिसत आहे. अशोक खरातनंतर टीसीएस कंपनीमधला लव्ह जिहाद प्रकरण, या नंतर आता आणखी एक धर्मांतराचा प्रकार समोर आला असून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी तंजीर इनामदारला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीने पंचवटी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी तंजीर इनामदारने तिला लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेले. तिथे आपल्याला बळजबरी दारू आणि सिगारेट पिण्यास भाग पाडले. पीडिता शुद्धित नसताना तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गळ्यातील तुळशीमाळ आणि हातातला धागाही तोडला या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तंजीर इनामदारने पीडित तरुणीने आपल्या गळ्यात घातलेली तुळशीमाळ आणि हातावर बांधलेला धागा बळजबरी तोडला होता. तसेच आरोपीने बळजबरीने एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे गजवा-ए-हिंदचे पालन करण्यास सांगून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडित तरुणीच्या धार्मिक ओळखीवरच घाला घालण्याचे कारस्थान या आरोपीने केले होते. गळ्यावर लव्ह बाईट, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार आरोपीने जानेवारी महिन्यात पीडित तरुणीच्या गळ्याजवळ चावा घेत हे लव्ह बाईट असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने तिला वारंवार विविध ठिकाणी लॉजवर नेत तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. आणखी काही मुलींचेही लैंगिक शोषण केल्याचा संशय संशयित आरोपी तंजीर इनामदारने अशाच पद्धतीने शहरातील आणखी काही मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचेही लैंगिक शोषण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या तक्रारीवरून त्याच्यावर सध्या गुन्हा दाखल करण्यात अल असला तरी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. तंजीर इनामदारला कोर्टात हजर करण्यात आले असून पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली आहे. कोर्टात दोन्ही पक्षाकडील युक्तिवाद तंजीर इनामदारला कोर्टात हजर करण्यात आले असता यावेळी सरकारी पक्षाने केलेल्या युक्तिवादात म्हटले की, तंजीर इनामदार महागड्या लॉजमध्ये पीडित तरुणीला न्यायचा. दारू सिगारेट पिण्यास भाग पडायचा. धर्मांतर करण्यासाठी पीडित तरुणीला जबरदस्ती करण्यात आली. तसेच हे प्रकरण देखील टीसीएस सारखेच असल्याचा दावा सरकारी पक्षाने केला. तसेच महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला? त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याचा शोध घ्यायचा असून त्यासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. तर आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादात म्हटले की, दोघेही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. जानेवारी महिन्यात अत्याचार झाला तर तेव्हापासून आतापर्यंत वेळ का घालवला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच फोटो दाखवून धमकीचा व दारू सिगारेटचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. विशेष म्हणजे दोघांचेही एकमेकांवर प्रेम असून घरच्यांनी विरोध केल्याने आता हा आरोप होत असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे.
अजय-अतुल यांची पुढची पिढी सिनेसृष्टीत! ‘राजा शिवाजी’चित्रपटातून आर्य गोगावलेचे पदार्पण
मुंबई: आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताने संपूर्ण देशाला वेड लावणारी जोडी म्हणजे अजय-अतुल. आता याच जोडीचा वारसा पुढे नेण्यासाठी अतुल गोगावले यांचा मुलगा आर्य गोगावले सिनेसृष्टीत दाखल झाला आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटातील ‘छत्रपती’ या अँथम साँगमध्ये आर्यची झलक दिसली असून, त्याच्या या एन्ट्रीमुळे चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली […] The post अजय-अतुल यांची पुढची पिढी सिनेसृष्टीत! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातून आर्य गोगावलेचे पदार्पण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आरोपी निदा खानचा पती मोईन खान जाळ्यात
ठाणे : प्रतिनिधी नाशिकमधील आयटी क्षेत्रात काम करणा-या निदा खान या महिलेच्या प्रकरणाने नाट्यमय वळण घेतले असून, पोलिस तपासात नवनवे खुलासे समोर येत आहेत. नोकरी गमावल्यापासून सुरू झालेल्या घटनाक्रमाने आता गुन्हेगारी स्वरूप धारण केले असून, तिच्या पतीला एसआयटीने ताब्यात घेतल्याने या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे. नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसतध्ये कार्यरत असलेल्या महिला आरोपी निदा […] The post आरोपी निदा खानचा पती मोईन खान जाळ्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पर्यटकांची गाडी दरीत कोसळली; ५ शिक्षिकांसह ९ जण ठार
कोइम्बतूर : तामिळनाडूतील वालपराई-पोल्लाची घाटात शुक्रवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. पर्यटकांची गाडी खोल दरीत कोसळल्याने केरळमधील ९ पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मल्लापूरम जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील पाच शिक्षिकांचा समावेश आहे. केरळच्या मल्लापूरम जिल्ह्यातील पेरिंथलमन्ना येथून १३ जण वालपराई येथे पर्यटनासाठी गेले होते. शुक्रवारी संध्याकाळी ५:१५ च्या […] The post पर्यटकांची गाडी दरीत कोसळली; ५ शिक्षिकांसह ९ जण ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मल्याळम कलाविश्वावर शोककळा: प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे कर्करोगामुळे निधन
कोची: मल्याळम टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय चेहरा आणि प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ वेणुगोपाल (Siddharth Venugopal) यांचे शनिवारी (१८ एप्रिल २०२६) कर्करोगाशी झुंज देताना निधन झाले. ते ४१ वर्षांचे होते. गेल्या दोन वर्षांपासून ते या गंभीर आजाराशी लढा देत होते, मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. कर्करोगाशी दोन वर्षांची झुंज सिद्धार्थ वेणुगोपाल यांना दोन वर्षांपूर्वी ‘न्यूरोएंडोक्राइन कार्सिनोमा’ (Neuroendocrine […] The post मल्याळम कलाविश्वावर शोककळा: प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे कर्करोगामुळे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता वाढला
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (दि. १८) केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली. प्रस्तावित ८ व्या वेतन आयोगांतर्गत वेतन रचनेत मोठे बदल करण्याच्या कर्मचारी संघटनांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल कॉन्सिल-जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीने सरकारला सादर केलेल्या निवेदनात वेतन रचनेत मोठे बदल करण्याची मागणी केली आहे. यात […] The post केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता वाढला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘भोंदू बाबा अशोक खरातला वाचवण्यासाठी निदाला गोवलं’; टीसीएस धर्मांतर प्रकरणात वडिलांचा खळबळजनक आरोप
नाशिक: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या नाशिकमधील बीपीओ केंद्रात गाजलेल्या कथित धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणात आता एक नवीन वळण आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेली निदा खान हिच्या वडिलांनी सर्व आरोप फेटाळून लावत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्यावरील बलात्काराचे प्रकरण दाबण्यासाठी आणि लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी […] The post ‘भोंदू बाबा अशोक खरातला वाचवण्यासाठी निदाला गोवलं’; टीसीएस धर्मांतर प्रकरणात वडिलांचा खळबळजनक आरोप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संघाच्या ‘झेड प्लस’ सुरक्षेचा खर्च वसूल करा
नागपूर : प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुरवण्यात येत असलेल्या ‘झेड प्लस-व्हीव्हीआयपी’ सुरक्षा कवचाचा खर्च सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून वसूल करण्यात यावा, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते ललन किशोर सिंह यांनी अॅड. अश्विन इंगोले यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व राज वाकोडे […] The post संघाच्या ‘झेड प्लस’ सुरक्षेचा खर्च वसूल करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, १८ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित ‘संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक’ मंजूर होऊ शकले नाही, या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे हे संबोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. शुक्रवारी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी (Delimitation) संबंधित विधेयक दोन-तृतीयांश बहुमताअभावी फेटाळण्यात आले होते […] The post पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अॅक्सिस बँकेत असताना माझ्यासमोर ‘टीसीएस’सारख्या घटना घडल्या
नाशिक : नाशिकमधील टीसीएस कंपनीत मुस्लिम धर्मीय संशयितांकडून हिंदू महिला कर्मचा-यांचे लैंगिक शोषण, विनयभंग व जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. देशभरात या धक्कादायक प्रकरणाची चर्चा असताना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अमृता फडणवीस यांनीही बराच काळ काम केले आहे. त्याअनुषंगाने […] The post अॅक्सिस बँकेत असताना माझ्यासमोर ‘टीसीएस’सारख्या घटना घडल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराणचा ‘यू-टर्न’: ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर तणाव वाढला, ‘होर्मुझची सामुद्रधुनी’पुन्हा बंद
तेहरान: जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’वरून (Strait of Hormuz) आखाती देशांत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले आहेत. इराणने आधी हा सागरी मार्ग व्यापारासाठी खुला करण्याचे संकेत दिले होते, मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक विधानानंतर इराणने अचानक ‘यू-टर्न’ घेत हा मार्ग पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जागतिक बाजारात […] The post इराणचा ‘यू-टर्न’: ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर तणाव वाढला, ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
स्वयंरोजगार महिला मेळावा, संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन
परभणी : एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्रच्या वतीने संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती निमित्त स्वयंरोजगार मेळावा, संविधान गौरव सन्मानपत्र सोहळ्याचे शुक्रवार, दि.२४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३५ वाजता श्री शिवाजी विधी महाविद्यालय सभागृह वसमतरोड परभणी येथे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन वनामकृविचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी […] The post स्वयंरोजगार महिला मेळावा, संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गौण खनिज उत्खनन अन् वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपातून निलंबित केलेल्या तहसीलदार शारदा दळवी यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वात जास्त १५५ वाहने पकडण्यात आली. तसेच २.९१ कोटींचा दंडही आकारण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर झालेली कारवाई द्वेषभावनेतून झाल्याचा आरोप केला जात आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत अवैध गौणखनीज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. यामध्ये महसूल विभागाने तालुकास्तरावर तसेच पोलिस विभागानेही स्वतंत्र पथके स्थापन करून कारवाईची सपाटा सुरु केला आहे. त्यामुळे वाळू तस्करांना लगाम बसला आहे. दरम्यान, वसमत तालुक्यात तहसीलदार शारदा दळवी यांनी मागील अडीच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वात जास्त वाहनांवर कारवाई केली आहे. त्यांच्या कालावधीत वसमत तालुक्यातील तब्बल १५५ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर २.९१ कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. याशिवाय गुन्हेही दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी नांदेडहून येणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त कारवाई वसमत तालुक्यात असतानाही तहसीलदार दळवी यांच्यावर गौण खनीज उत्खननाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून त्यांना निलंबीत केले आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त कारवाई असतानाही त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे ही कारवाई द्वेषभावनेतून झाल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे. या प्रकारामुळे अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचा दावाही केला जात आहे. दरम्यान, या संदर्भात दीपक कदम,अलोक इंगोले, करण जाधव, अंकुश कोरडे यांच्यासह नागरीकांनी शासनाकडे पत्र पाठविले असून तहसीलदार दळवी यांच्यावर झालेली कारवाई चुकीच्या पध्दतीने झाली आहे. त्यांनी कठोर निर्णय घेतल्यामुळे काही जण दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावरील निलंबन रद्द करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
नाशिकमधील भोंदू अशोक खरात याचा निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचा उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ हा अपघात घडला. शेळके यांच्या कारने समोर असलेल्या कंटेनरला मागून जबरदस्त धडक दिली आणि कार थेट कंटेनरखाली घुसली. या दुर्घटनेत जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना घडल्यानंतर अपघाताबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, या अपघातामागे घातपाताची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रकरण गंभीरतेने घेत कंटेनर चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात त्याची सविस्तर चौकशी सुरू असून, या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, याचा शोध घेतला जात आहे. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीमुळे तपास अधिक बारकाईने केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी शेळके यांची कार भरधाव वेगात होती. वेग नियंत्रणात नसल्यामुळे कार थेट कंटेनरला धडकली आणि त्याखाली अडकली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणात कंटेनर चालक जमाल वारिस याने पोलिसांना दिलेल्या जबाबात महत्त्वाची माहिती दिली आहे. तो उत्तर प्रदेशातील अमेठीचा रहिवासी असून, हैदराबादहून अहमदाबादकडे जात होता. दुपारी सुमारे 12 वाजता कंटेनरच्या रेडिएटरचा पाइप लीक झाल्यामुळे वाहन गरम झाले. त्यामुळे त्याने वाहनाचा वेग कमी केला होता. मात्र, त्याने गाडी पूर्णपणे थांबवली नव्हती, असे त्याने स्पष्ट केले. जमाल वारिसने पुढे सांगितले की, तो रस्त्याच्या कडेला सावकाश गाडी चालवत असताना अचानक मागून जोरदार आवाज आला. त्या वेळी आरशात काही दिसले नाही. नंतर खाली उतरून पाहिले असता कार कंटेनरला धडकलेली दिसली. या घटनेने तोही हादरला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर अपघाताची दिशा स्पष्ट होत असली तरी काही शंका अद्याप कायम आहेत. समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. चालकाची आणखी कसून चौकशी केली जाणार असून, अपघातामागे निष्काळजीपणा की अन्य काही कारण, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. दरम्यान, जितेंद्र शेळके यांच्या निधनामुळे त्यांच्या परिचितांमध्ये शोककळा पसरली असून, या घटनेने समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी 15 हजार रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता त्यांच्यावर थेट निलंबनाची कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर खाणमालकांकडून प्रत्येकी 15 हजार रुपयांची मागणी करत त्यांना धमकावल्याचा आरोप होता. खाण व क्रशर मालकांनी या प्रकरणी 2 आठवड्यांपूर्वी त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, गायकवाड यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे अकोल्याच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी या प्रकरणी प्रशासनावर टीका केली होती. त्यानंतर सरकारने प्रमोद गायकवाड यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. तसेच या घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले होते. त्यानंतर आता सरकारने थेट प्रमोद गायकवाड यांच्या निलंबनाचे आदेश काढलेत. निलंबन काळात गायकवाड यांचे मुख्यालय अकोला जिल्हाधिकारी कार्यालय असेल. त्यांना पूर्वसूचनेशिवाय अकोला मुख्यालय सोडता येणार नाही. नेमके प्रकरण आहे तरी काय? अकोला जिल्ह्यात गौण खनिजाच्या असंख्य खाणी आहेत. या खाणींमधून दगड, गिट्टी, मुरूम काढला जातो. त्यापोटी गौण खनिज विभागाला स्वामित्वधन शुल्क प्राप्त होते. महसूल विभागाकडून गौण खनिज विभागाला वसुलीचे लक्ष्य दिल्या जाते. मार्च महिन्यात स्वामित्व शुल्क वसुलीची लगबग सुरू असताना खाण मालक संघटनेने अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर प्रत्येकी 15 हजार रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला होता. खाणी बंद पाडण्याची धमकी दिल्याचाही आरोप प्रमोद गायकवाड यांनी वारंवार भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. संघटनेच्या सदस्यांना कार्यालयात बोलावून अपमानित केले. पैशांची मागणी केली. काही ठिकाणी स्वत: जाऊन वसुली देखील केली. सर्व खाणी बंद पाडण्याची धमकी सुद्धा दिली. अखेर त्यांच्या त्रासाला कंटाळून या प्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे ही वाचा… भोंदू खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश; धर्मांतर प्रकरणाचाही घेतला आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पोलिसांना भोंदू अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले. प्रस्तुत प्रकरणात कुणीही दोषी असला तरी त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी या प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराधसिद्धी हाच महत्त्वाचा घटक असला पाहिजे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नाशिक धर्मांतर प्रकरणाचाही विस्तृत आढावा घेतला. वाचा सविस्तर अखेर 18 वर्षीय तरुणी गेली तरी कुठे?:हात हवेत वर करत कुणीतरी खेचून नेल्यासारखी एकटीच चालत गेली; चक्रावून टाकणारी घटना धुळे शहरातील एक 18 वर्षीय तरुणी हवेत हात वर करत म्हणजे कुणीतरी हाताला धरू नेल्यासारखे अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ही तरुणी अत्यंत गुढपणे चालत जात असल्याची दिसून येत आहे. वाचा सविस्तर
हापूस आंब्याची आवक वाढली; दरात घसरण
मुंबई : प्रतिनिधी कोकणातील हापूस आंब्याचा मुख्य हंगाम सुरू होताच वाशीच्या घाऊक बाजारात आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. वाढलेल्या आवकेमुळे आंब्याच्या दरात काहीशी घसरण झाली असून, त्यामुळे आंबा खवय्यांना आता हापूसचा आस्वाद घेणे सुलभ होणार आहे. अक्षय्य तृतीयेमुळे बाजारात आंब्याची आवक वाढली आहे . यंदा मात्र बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसल्याने कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन […] The post हापूस आंब्याची आवक वाढली; दरात घसरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी मुंबई : प्रतिनिधी युद्धजन्य परिस्थितीमुळे भडकलेल्या महागाईला मिरचीने तडका दिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाळवलेल्या लाल मिरचीचे भाव किलोमागे शंभर ते तीनशे रुपयांनी वाढले आहेत. कर्नाटक बेडगी, काश्मिरी मिरची २०० ते ३०० रुपये किलोमागे महागली असून, आंध्र प्रदेशातील तेजा जातीच्या मिरचीचे दर १०० ते १२० रुपयांनी वाढले आहेत. मुंबईकरांची तेजा, बेडगी आणि काश्मिरी जातीच्या […] The post लाल मिरचीला महागाईचा तडका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्य सरकारने स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित करत त्यावरील भरती प्रक्रियेला फुलस्टॉप दिला आहे. राज्यातील बेरोजगारीचा आकडा झपाट्याने वाढत असताना सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. सरकारने तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. सरकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून लघुलेखक अर्थात स्टेनोग्राफर पदाची भरती करते. पण आता सरकारने हे पद मृत घोषित करून त्यावरील भरती प्रक्रिया थांबवली आहे. यामुळे हजारो तरुणांचे स्टेनोग्राफर होण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गात कमालीचा रोष पसरला आहे. एकीकडे सरकार पदभरती करत नाही आणि दुसरीकडे अशा पद्धतीने आहे ती पदे रद्द करण्याचा निर्णय घेते, असा आरोप विद्यार्थ्यांनी या प्रकरणी केला आहे. विद्यार्थ्यांचा सरकारच्या निर्णयावर संताप सरकारने स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित करू नये. कारण विद्यार्थी मागील 5 वर्षांपासून या पदाच्या परीक्षेची तयारी करत आहेत. आता सरकारने अचानक हे पद रद्द केल्याने त्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. त्यामुळे सरकारने हे पद मृत घोषित न करता त्यावर भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सरकारच्या निर्णयामुळे स्टेनोग्राफरचे प्रशिक्षण घेतलेल्या लाखो उमेदवारांचे भविष्य अंधारात बुडण्याची भीती आहे. सरकारने आपला निर्णय मागे घेतला नाही, तर पुढच्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही विद्यार्थ्यांनी सरकारला दिला आहे. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी स्टेनोग्राफर पदाची तयारी करतात. आता शासनाने ही भरतीच बंद केली, तर त्यांनी जायचे कुठे? विद्यार्थी गत अनेक वर्षांपासून या परीक्षेची तयारी करत हरोते. आता लगेच दुसरी फिल्ड निवडताही येत नाही, अशी खंतही काही विद्यार्थ्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली. रोजगाराच्या संधी हिरावून घेऊ नका - सुप्रिया सुळे दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी सरकारचे कान टोचलेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदाची भरती थांबविण्यात आली असून हे पद मृत घोषित करण्यात आले आहे. यामुळे क्लासेस लावून 'स्टेनोग्राफी' चा कोर्स केलेल्या हजारो तरुणांची निराशा झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्टेनोग्राफर पदासाठी तयारी करतात. ही भरती शासनाने रद्द केल्याने आता नेमकं काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया या पदासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांची कैफियत शासनाने एकदा ऐकून घ्यावी. हे पद मृत घोषित करण्याऐवजी त्यात काही कौशल्ये जोडून ते सुरू ठेवण्याचा पर्यायही तपासून पहावा. तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने तिची अटक आणि रिमांड प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याचे नमूद करत जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, बावधन पोलिसांच्या कामकाजातील हलगर्जीपणाचा फायदा तेजवानीला झाल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. या निर्णयामुळे पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…
महिला आरक्षण कायदा 2023 मध्येच मंजूर झाला असताना, आता मतदारसंघांची फेररचना करण्याचा घाट कशासाठी? असा सवाल करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे. विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे लोकशाहीविरोधी विधेयक पराभूत झाल्याचा दावा करत, त्यांनी 2029 च्या निवडणुकीत सध्याच्याच रचनेत 33 टक्के महिला आरक्षण लागू करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांच्यासह प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभेत महिला आरक्षण बीलाच्या विरोधात भूमिका घेतली होती. या बीलाच्या विरोधात त्यांनी मतदान केले. मात्र, प्रियांका चतुर्वेदींनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतली. यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्याचा हवाला देत उबाठावर टीका केली यानंतर प्रियांका चतुर्वेदी यांनी नारी शक्ती विधेयक आणि लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवणारे मुद्दे एकत्र करण्याचा प्रयतन केला आहे. पावसाळी अधिवेशनात सरकारने 543 खासदारांमध्येच महिलांना 33 टक्के आरक्षणाचेबिल आणावे त्याला आम्ही सर्व पाठिंबा देऊ, असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न उबाठाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी केला आहे. ..तर विधेयकाला पाठिंबा देऊ प्रियांका चतुर्वेदी यांनी 24 तासांच्या आत भूमिका बदलत आदित्य ठाकरेंच्या सुरात सुर मिसळला आहे. चतुर्वेदी म्हणाल्या की, पावसाळी अधिवेशनात हे बिल सत्ताधाऱ्यांनी आणावे आणि आता जितके सदस्य त्यातूनच महिलांना 33 टक्के आरक्षण द्यावे. महिलांना आरक्षण देणं आणि मतदारसंघ फेररचना करणे दोन्ही गोष्टी एकत्र केल्यानेच काल बिल मंजूर झाले नाही. दोन्ही गोष्टी एकत्र करू नये. तुम्ही जर केवळ महिला आरक्षणाचे बिल आणणार असाल तर विरोधी पक्ष तुम्हाला साथ देईल. यामुळे 2029 मध्ये 180 महिला खासदार लोकसभेत दिसू शकतील. दुसरीकडे जर आपल्याकडे इच्छाशक्ती नसेल तर किमान पक्षात तरी 33 टक्के उमेदवारी महिलांना देताल का? असा सवाल चतुर्वेदी यांनी केला आहे. आरक्षण लागू होऊ शकते केवळ दोन गोष्टी एकत्र करू नये. आदित्य ठाकरेंचे ट्विट काय? आदित्य ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकारने राजकीय हेतूने संविधानात दुरुस्ती करून लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवणारे, अनेक राज्यांचा आवाज दाबणारे आणि गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठी मतदारसंघांची फेररचना करण्याचा प्रयत्न करणारे मांडलेले विधेयक, काल संसदेत पराभूत झाले. संविधानातील हा हस्तक्षेप भारतातील लोकशाहीसाठी पर्यायाने संविधानाकरिताही मारक ठरला असता, पण हा प्रयत्न विरोधी पक्षाच्या खासदारांच्या एकजुटीमुळे फेटाळण्यात आला. कायदा 2023 मध्येच मंजूर आदित्य ठाकरे म्हणाले की, खरे म्हणजे, महिला आरक्षण कायदा 2023 मध्ये संसदेत मंजूर झाले असून, त्याची अधिसूचना 16/04/2026 रोजी जारी करण्यात आली होती.आजच्या विधेयकाला गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक असे नाव द्यायला हवे होते. खरे तर सध्याच्या जागांमध्येच 33% महिला आरक्षण लागू करण्याची, आवश्यकता आहे! सरकारची खरीच तशी भूमिका असेल तर 2029 च्या लोकसभा निवडणुकांसाठी 543 जागांमध्ये तसेच देशभरातील सर्व निवडणुकांमध्ये हे आरक्षण प्रभावीपणे लागू करणे आवश्यक आहे. प्रियांका चतुर्वेदींनी आरसा दाखवला- बन नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आरसा दाखवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ट्विट बघण्यापेक्षा चतुर्वेदींनी केलेले ट्विट राऊतांनी बघितले तर त्यांचे डोळे उघडतील. महिला आरक्षणाचे समर्थन करण्याचे काम त्यांनी केले मी त्यांचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी नारी शक्तीच्या हिताची भूमिका घेतली. तुम्हाला महिलांबद्दल अभिमान वाटत नाही म्हणून तुम्ही विरोधात भूमिका घेतली. नारी शक्तीचा अपमान करण्याचे काम तुम्ही केले आहे, महिला तुम्हाला माफ करणार नाही.
महाराष्ट्राच्या गौरवशाली मातीत सत्यशोधकी जलशांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ लोककलावंत शाहीर रामदास नाथाजी गुंड यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांनी कलगीतुऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर असंख्य कार्यक्रम करून लोककलेला एक वेगळे स्थान मिळवून दिले. त्यांच्या निधनावर मंत्री छगन भुजबळ, काँग्रेस विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. शाहीर रामदास नाथाजी गुंड यांचे गाव अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील काताळवेढे आहे. त्यांचा पुणे जिल्ह्यातील गावागावात मोठा संपर्क होता. ते गावोगावी फिरून महागाई, दरवाढ, आरक्षण, बैलगाडा बंदी, बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या, जागतिक युद्ध, कोरोना महामारी, व्यसनमुक्ती आदी विविध सामाजिक मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी अनेक नवोदित कलाकार घडवले. त्यातून शाहिरी परंपरेला नवे बळ मिळाले. ते आपल्या कलगीतुरा फडासाठी ओळखले जायचे. चार वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणांचा भेद मांडणारा दुर्मिळ प्रकार त्यांनी आपल्या कलेतून जिवंत ठेवला. पण आता शाहिरी क्षेत्रातील हा तरबेज 'गुंड' कायमचा शांत झाल्याने डफ पोरका झाला. डफावरच्या थापीने समाजमन जागृत करणारा कलावंत हरपला - भुजबळ मंत्री छगन भुजबळ यांनी शाहीर गुंड यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या गौरवशाली मातीतील बुलंद आवाज आणि सत्यशोधकी जलशांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ लोककलावंत प्रबोधनकार शाहीर रामनाथ नाथाजी गुंड यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने डफावरच्या थापीने समाजमनाला जागृत ठेवणाऱ्या एका महान कलावंताचा अंत झाला आहे. शाहिरी ही केवळ मनोरंजन नसून ते समाज परिवर्तनाचे शस्त्र आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या रचनांमधून व्यक्त होणारा शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजाचा हुंकार कायमच प्रेरणादायी राहील. शाहीर रामनाथजींनी केवळ कलाच जोपासली नाही, तर नव्या पिढीला लोककलेचा वारसा देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने एक प्रबोधनाचा झंझावात शांत झाला असला तरी, त्यांनी दिलेला विचारांचा वारसा आपण सदैव पुढे नेऊया. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे ते म्हणालेत. गुंड यांचे निधन मन सुन्न करणारे - वडेट्टीवार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही गुंड यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, डफावरची थाप आणि पहाडी आवाजाच्या जोरावर समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा देणारे ज्येष्ठ लोककलावंत शाहीर रामनाथजी गुंड यांच्या निधनाचे वृत्त मन सुन्न करणारे आहे. लोककलेच्या माध्यमातून समाजजागृतीचा एक धगधगता वारसा आज शांत झाला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. शाहिरी ही केवळ कला नसून ते परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम आहे, हे रामनाथजींनी आपल्या पहाडी आवाजातून आणि धारदार शब्दांतून वारंवार सिद्ध केले. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी खेड्यापाड्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले. कष्टकरी, शेतकरी आणि बहुजन समाजाच्या हितासाठी त्यांनी आयुष्यभर दिलेला वैचारिक लढा सदैव स्मरणात राहील. रामनाथजींचे जाणे ही कला क्षेत्रातील एक न भरून निघणारी पोकळी आहे. त्यांच्या जाण्याने प्रबोधनाचा एक तेजस्वी झंझावात थांबला असला, तरी त्यांनी रचलेल्या पोवाड्यांतून आणि गीतांतून त्यांचा विचार महाराष्ट्राच्या मातीत कायम जिवंत राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असे वडेट्टीवार म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पोलिसांना भोंदू अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले. प्रस्तुत प्रकरणात कुणीही दोषी असला तरी त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी या प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराधसिद्धी हाच महत्त्वाचा घटक असला पाहिजे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नाशिक धर्मांतर प्रकरणाचाही विस्तृत आढावा घेतला. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गृहविभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी नाशिकच्या भोंदू अशोक खरात व आयटी धर्मांतर प्रकरणासह परतवाडा व गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाचा विस्तृत आढावा घेतला. या बैठकीला पोलिस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री प्रस्तुत प्रकरणांत आरोपी कोण आहेत? हे न पाहता संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. तपासात अपराधसिद्धी हाच महत्त्वाचा घटक सूत्रांच्या मते, मुख्यमंत्र्यांनी अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांच्या सुरक्षेवर प्राधान्यक्रमाने भर दिला. ते म्हणाले, प्रस्तुत प्रकरणातील पीडित महिलांना संपूर्ण विश्वास द्या. या प्रकरणी कुणीही दोषी असो त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कोर्टात ही केस मजबूत कशी होईल, हे निश्चित करण्यासाठी भक्कम पुरावे शोधा. तपासात अपराधसिद्धी हाच एकमेव महत्त्वाचा घटक असला पाहिजे. नाशिक धर्मांतराची घेतली गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराच्या घटनेचीही गंभीर दखल घेतली. राज्यात धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका. नाशिक पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणले. त्यांचे अभिनंदन. पण आता तेवढाच दमदार तपासही झाला पाहिजे. या प्रकरणातील सर्वच पॅटर्नचा तपास करा. कोणताही अँगल तपासून सूटू देऊ नका, असे ते म्हणाले. गोरेगाव ड्रग्ज व परतवाडा प्रकरणावरही भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी गोरेगाव ड्रग्ज प्रकरण व परतवाडा प्रकरणावरही भाष्य करत पोलिसांना संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी ड्रग्जविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करावी. तरुणाच्या भविष्याशी निगडीत ही बाब आहे. त्यामुळे अशी प्रकरणे गांभिर्याने घेतली पाहिजे. परतवाडा प्रकरणातील पीडितांचे समुपदेशन करून त्यांना तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यांना विश्वास दिले पाहिजे. या प्रकरणी संबंधित समाजसेवकांची मदत घेतली पाहिजे, असे ते पोलिसांना योग्य ते निर्देश देताना म्हणाले. हे ही वाचा… अखेर 18 वर्षीय तरुणी गेली तरी कुठे?:हात हवेत वर करत कुणीतरी खेचून नेल्यासारखी एकटीच चालत गेली; चक्रावून टाकणारी घटना धुळे शहरातील एक 18 वर्षीय तरुणी हवेत हात वर करत म्हणजे कुणीतरी हाताला धरू नेल्यासारखे अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ही तरुणी अत्यंत गुढपणे चालत जात असल्याची दिसून येत आहे. वाचा सविस्तर
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीत मोठी घडामोड समोर आली आहे. माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने भाजप नेते आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास राज्यमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर नितेश राणे यांना आता प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार आहे. या प्रकरणाची सुरुवात एका राजकीय वक्तव्यापासून झाली होती. 7 मे रोजी नितेश राणे यांनी केलेल्या विधानात त्यांनी असा दावा केला होता की, संजय राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. त्यांनी 10 जूनपर्यंत हा प्रवेश होईल, असेही स्पष्टपणे सांगितले होते. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. मात्र, संजय राऊत यांनी हे वक्तव्य आपली सार्वजनिक बदनामी करणारे असल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली. याचिकेत राऊत यांनी म्हटले होते की, त्यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी जाणूनबुजून असे विधान करण्यात आले. त्यामुळे त्यांनी नितेश राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला. हे प्रकरण माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरू होते. दरम्यान, या खटल्याची सुनावणी दुसऱ्या न्यायालयात व्हावी, अशी मागणी करत नितेश राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. यानंतर न्यायालयाने दिलेल्या पुढील तारखांना नितेश राणे अनुपस्थित राहिल्याचे नोंदवण्यात आले. सलग दोन वेळा हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने कडक भूमिका घेत त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता या प्रकरणात नवा वळण आले असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण वादाची पार्श्वभूमी पाहता, संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यातील राजकीय संघर्ष नवा नाही. यापूर्वीही दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अनेक वेळा जोरदार टीका केली आहे. मे 2023 मध्ये नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत त्यांचा उल्लेख अपमानास्पद शब्दांत केल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्या घटनेनंतरच या मानहानी प्रकरणाची बीजे रोवली गेली होती. दोन्ही नेते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष दरम्यान, सत्तांतरानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असताना या प्रकारच्या वक्तव्यांमुळे वातावरण अधिक तापले आहे. राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा, त्यावरून निर्माण झालेला वाद आणि आता न्यायालयीन कारवाई यामुळे या प्रकरणाला अधिकच गंभीर स्वरूप आले आहे. पुढील सुनावणीमध्ये काय घडते, तसेच दोन्ही नेते या प्रकरणावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हिंगोली जिल्हा भाजपामध्ये निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना पदे देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमधून अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र पक्ष शिस्तीमुळे कोणीही बोलण्यास तयार नसल्याने कार्यकर्त्यांवर तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी वेळ आल्याचे चित्र आहे. हिंगोली जिल्हयात भाजपामध्ये मागील काही दिवसांपासून प्रवेश घेणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. इतर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून भाजपात प्रवेश घेतला जाऊ लागला आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात भाजपाची ताकद वाढत असल्याचे बोलले जात असले तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून मात्र चांगलीच अस्वस्थता दिसून येऊ लागली आहे. भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून हिंगोली जिल्हयाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे इतर पक्षातून येणाऱ्यांची स्वागत केले जात आहे. काही दिवसांपुर्वीच कळमनुरीच्या एका नेत्याला भाजपात प्रवेश देण्यात आला. मात्र पक्ष प्रवेश होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत याची कानोकान खबरही स्थानिक पदाधिकाऱ्यांना झाली नाही. त्यानंतर काही दिवसांपुर्वीच इतर पक्षातून प्रवेश केलेल्या एका नेत्याला देशाच्या वरिष्ठ सभागृहात पाठविले. राज्य पातळीवरील या घडामोडी घडल्या. त्यानंतर मागील दोन दिवसांत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये भाजपाच्या सहसंपर्क प्रमुख रेखा कुलकर्णी यांच्या हस्ते नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या ते पदाधिकारी इतर पक्षांतून भाजपात नुकतेच आले होते. त्यांचे पक्षात कोणतेही काम नसतांनाही त्यांना पदे बहाल करण्यात आली तसेच नगर पालिका निवडणुकीतही स्विकृत सदस्याच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे. दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांची शहर, जिल्हा कार्यकारीणीवर वर्णी लावली जात असतांना निष्ठावंतांना मात्र डावलले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजापच्या निष्ठावंतांमधून नाराजीचा सुर उमटू लागला आहे.
हिंगोली तालुक्यातील हळदवाडी साठवण तलावाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु झाले असून कामाला गती आली आहे. या तलावात 1.646 दशलक्ष घनमीटर पाणीसठा होणार असून त्यातून दोन गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या शिवाय 298 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. तलावाच्या कामाची शनिवारी ता. 18 आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पाहणी केली. हिंगोली तालुक्यातील हळदवाडी शिवारात जलसंपदा विभागाच्या वतीने सुमारे 39 कोटी रुपये खर्चुन तलावाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. य तलावासाठी नर्सी नामदेव व वैजापूर शिवारातील 39 हेक्टर जमीनीवर तलावाचे बांधकाम केले जात आहे. सदर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या तलावामध्ये 1.646 दशलक्ष घनमिटर पाणीसाठी होणार आहे. त्यातून नर्सी नामदेव व पुसेगाव या दोन गावांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या शिवाय 298 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून शेती सिंचनासाठी पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना एकरी उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तलावाचे काम युध्दपातळीवर सुरु असून मे अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रयत्न असल्याचे जलसंपदा विभागाच्या सहाय्यक अभियंता प्राजक्त भुजाडले यांनी सांगितले. या तलावाच्या बांधकामाची आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पाहणी केली. यावेळी सहाय्यक अभियंता भुजाडले, ॲड. के. के. शिंदे, संतोष टेकाळे, विलास गोरे, माणिक लोडे, आसाराम घुगे, सरपंच शंकर सिंदे, प्रल्हाद शिंदे, रुस्तुम शिंदे, प्रद्युम्न गिरीकर, शिवाजी मेटकर यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार मुटकुळे यांनी तलावाच्या कामाबाबत आवश्यक सूचनाही दिल्या आहेत
धुळे शहरातील एक 18 वर्षीय तरुणी हवेत हात वर करत म्हणजे कुणीतरी हाताला धरू नेल्यासारखे अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ही तरुणी अत्यंत गुढपणे चालत जात असल्याची दिसून येत आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, संजीवनी राहुल वराडे असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती धुळ्यातील शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगर येथून शुक्रवारी दुपारी बेपत्ता झाली. गत काही दिवसांपासून धुळ्यात महिला व मुली बेपत्ता होण्याच्या अनेक घटना घडल्यात. या सर्व घटना आमिष दाखवून किंवा फुस लावून पळवून नेल्याच्या आहेत. पण संजीवनी वराडेची घटना काही औरच आहे. ती अक्षरशः एखाद्या अदृश्य शक्तीने हात धरून ओढत न्यावे, अशा पद्धतीने हवेत हात वर करून कुठेतरी जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पालकवर्गांत एकच दहशत पसरली आहे. घटनेचा व्हिडिओ झाला व्हायरल या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात संजीवनी घराबाहेर उभी असल्याचे दिसते. त्याचवेळी एक वृद्ध व्यक्ती तिच्यासमोरून जातो. हा व्यक्ती गेल्यानंतर दुसऱ्याच क्षणी संजीवनी शुद्ध हरपल्यासारखी चालू लागते. चालताना तिचा हात कुणीतरी खेचल्यासारखे वाटत आहे. कारण, संजीवनी पुढे जात असताना आपला हात कुणाच्या तरी हातात देऊन चालताना दिसून येत आहे. सीसीटीव्हीत तो व्यक्ती दिसत नाही. पण संजीवनीचा हात हवेत अधांतरी तरंगत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ती गुंगीत किवा झोपेत असल्याचे भासते. नेमके काय घडले? सर्वचजण चक्रावले दुसरीकडे, संजीवनी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. पण ती अद्याप सापडली नाही. दिवसाढवळ्या घडलेल्या या विचित्र घटनेमुळे सर्वचजण चक्रावेल आहेत. अखेरीस संजीवनी गेली कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. काही प्रत्यक्षदर्शी व व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मते, संजीवनीचे संमोहनाच्या मदतीने अपहरण केले जाण्याची शक्यता आहे. संजीवनी शुद्धीत नसून, तिला कुणीतरी अशा पद्धतीने नेल्याची चर्चा स्थानिकांत रंगली आहे. संजीवनी एखाद्या खोल विचारात असताना घराबाहेर पडली असावी व त्याच स्थितीत ती कुठेतरी गेली असावी, असा अंदाजही अनेकांनी वर्तवला आहे. हे ही वाचा… एक लाख अशोक खरात मिळून 1 अकबर होईल:शरद पोंक्षेंनी सम्राट अकबराशी केली खरातची तुलना; 'जोधा' काल्पनिक असल्याचा दावा अभिनेते शरद पोंक्षे यांनी भोंदू अशोक खरातची तुलना थेट मुगल सम्राट अकबराशी केली आहे. एक लाख अशोक खरात एकत्र केले, तर एक अकबर तयार होईल. मुगल ए आझम चित्रपटात अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासात अस्तित्वात नसलेले जोधा नामक पात्र घुसवण्यात आले, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची
मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यम आणि मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली जाणार आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययनाची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या नियमाचे उल्लंघन करणा-या शाळांवर कारवाई देखील केले जाणार आहे. नियम मोडणा-या शाळांवर १ […] The post राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रात उष्णतेचा इशारा; विदर्भात तापमान ४४ अंश पार
मुंबई : प्रतिनिधी राज्यात सध्या तापमान खूप जास्त वाढताना दिसत आहे. घराबाहेर पडल्यावर घामाच्या धारा लागतात. दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात झाली आहे. विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कडक उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा-कॉलेजला सुटी देण्यात आली आहे. विदर्भात तापामानाचा पारा वाढतच […] The post महाराष्ट्रात उष्णतेचा इशारा; विदर्भात तापमान ४४ अंश पार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र काँग्रेसने महिला आरक्षणाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे खाल्लेल्या मीठाला जागायला शिकले पाहिजे. पाठीचा कणा थोडा तरी मजबूत राखला पाहिजे, असे काँग्रेसने म्हटले आहे. अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री नारी शक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित घटनादुरुस्ती लोकसभेत नामंजूर फेटाळल्यावरून काँग्रेसवर सडकून टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारीशक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून 2029 च्या निवडणुकीपासून महिलांना लोकसभा व विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू व अनाठायी भूमिकेमुळे या प्रयत्नांत अडसर आणला गेला, असे ते म्हणाले होते. महाराष्ट्र काँग्रेसने या प्रकरणी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार पलटवार केला. काँग्रेसचा चव्हाणांना पाठीचा कणा मजबूत ठेवण्याचा सल्ला काँग्रेसने अशोक चव्हाणांचे ट्विट रिट्विट करत म्हटले की, अशोकराव, ज्या कॉंग्रेस पक्षाशी आपले वडील स्व. शंकरराव चव्हाण साहेब आयुष्यभर एकनिष्ठ राहीलेत, त्याच कॉंग्रेस पक्षासोबत आपण गद्दारी करण्याअगोदर 2023 मध्येच, “नारी शक्ती वंदन अधिनियम - 2023”, म्हणजेच लोकसभा व विधानसभेच्या जागांमध्ये महिलांसाठीचे 33% आरक्षण हे संसदेत एकमताने (कॉंग्रेसच्या पाठींब्याने) मंजूर झालेले आहे. ते 16 एप्रिल 2026 पासून लागू ही झाले आहे. आपल्या माहितीसाठी, ज्यांच्यामुळे आपण पहिल्यांदा लोकसभेच्या सभागृहात निवडून गेलात त्या स्व. राजीव गांधी यांनीच स्थानीक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण लागू केलं व नंतर 50% आरक्षण ही कॉंग्रेसच्याच काळात लागू करण्यात आलं. खाल्लेल्या मीठाला जागायला शिका, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या, असे काँग्रेसने म्हटले आहे. खाली वाचा काय म्हणाले होते अशोक चव्हाण अशोक चव्हाण म्हणाले होते, नारीशक्ती वंदन अधिनियमाशी निगडीत घटना दुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून येत्या 2029 च्या निवडणुकीपासून लोकसभा व सर्व राज्यांच्या विधानसभेत 33 टक्के महिला आरक्षण लागू करण्याचा एक चांगला प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केला. मात्र, राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू व अनाठाय़ी भूमिकेमुळे या प्रयत्नात अडसर आणला गेला आहे. विरोधी पक्षांच्या सर्व शंका-कुशंकांना केंद्र सरकारने ठोस उत्तरे दिली. विरोधी पक्षांना हवे असेल तर सर्व राज्यांमध्ये सरसकट 50 टक्के लोकसभा मतदारसंघ वाढीबाबत सुधारणा आणण्याची तयारी गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत व्यक्त केली. परंतु, विरोधी पक्षांची एकंदर भूमिका लक्षात घेता त्यांना देशातील कोट्यवधी महिलांपेक्षा स्वतःचा राजकीय अहंकार महत्वाचा वाटला. त्यामुळेच सदर घटना दुरुस्ती विधेयकांना लोकसभेची मंजुरी मिळू शकली नाही. विरोधी पक्ष ज्याला आपला विजय समजत आहेत, तो दुर्दैवाने देशातील नारीशक्तीच्या हितांचा पराभव आहे. लोकसभा व विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण हा कोणताही राजकीय अजेंडा नाही. तर ते एक स्वप्न आहे, एक निर्धार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज नाही तर उद्या ते साकार झाल्याशिवाय राहणार नाही, असे चव्हाण म्हणाले होते.
पुण्यातील मुंढवा परिसरात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून ॲड. संजय सावंत याने आपल्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीच्या मदतीने महिला सेक्रेटरीचा क्रूरपणे खून केला. पूनम दिनेश मुन (वय 35) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी सावंत कुटुंबातील तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. पूनम मुन या गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. संजय सावंत यांच्या मुंढवा येथील कार्यालयात साहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. सावंत यांचे पूनम यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीची पत्नी स्वाती सावंत हिला होता. याच कारणावरून गुरुवारी (16 एप्रिल) कार्यालयात वाद झाला. संतापलेल्या संजय सावंत, पत्नी स्वाती आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीने पूनम यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पूनम यांचे पाय दोरीने बांधून त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने सपासप वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यात पूनम यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह पोत्यात भरला हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी पूनम यांचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि तो कार्यालयातच लपवून ठेवला. दुसऱ्या दिवशी संधी पाहून या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन आरोपींचे होते. मात्र, तत्पूर्वीच हा प्रकार उघडकीस आला. पोत्यात सापडला मृतदेह पूनम रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचे पती दिनेश मुन यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. त्यांनी संजय सावंत याला फोन केला असता, त्याने पूनम नातेवाइकांकडे गेली असावी, असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. रात्री 11 वाजता कुटुंबीयांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी शोध घेत असताना दिनेश मुन संशयावरून सावंत यांच्या कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांना एक रक्ताने माखलेले पोते दिसले. ते उघडताच त्यांना पत्नीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी ॲड. संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
अभिनेते शरद पोंक्षे यांनी भोंदू अशोक खरातची तुलना थेट मुगल सम्राट अकबराशी केली आहे. एक लाख अशोक खरात एकत्र केले, तर एक अकबर तयार होईल. मुगल ए आझम चित्रपटात अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासात अस्तित्वात नसलेले जोधा नामक पात्र घुसवण्यात आले, असे ते म्हणालेत. शरद पोंक्षे यांनी नांदेड येथे आयोजित परशुराम तजोत्सव व्याख्यानमालेत बोलताना उपरोक्त वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले. पूर्वी जात हा विषय नव्हता. संस्कृतीशी त्याचा कोणता संबंधही नव्हता. त्याची सुरुवात मुस्लिम आक्रमणापासून झाली. त्याला इंग्रजही तेवढेच जबाबदार आहेत. काँग्रेसने हिंदुत्वाची वज्रमूठ फोडून टाकली. आता सगळ्या जाती, आम्ही हिंदू नाही असे सांगत आहेत. त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे हे किडे सोडले आणि मुळापर्यंत जाऊन पोहोचले. हिंदुत्व कोणत्याही एका ग्रंथाशी बांधले गेले नाही. आमचा धर्मग्रंथ एक असून, 'हे विश्वची माझे घर' हे त्याचे ब्रीद वाक्य आहे. मोदींनी तुम्हाला जवळ का धरायचे? ते पुढे म्हणाले, धर्माच्या नावावर काही वेगळे मिळत नाही. मग मंदिरांवरच सरकारचा कंट्रोल का आहे? याविरोधात हिंदू कधी रस्त्यावर उतरत नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला जवळ का करायचे? स्वतःला सेक्युलर म्हणता, मग सरकारी पैसा हिंदू मंदिरांतून का जातो? 4 लाख हिदू मंदिरांतून पैसा सरकारी तिजोरीत जातो. मदरसे व चर्चमधून का जात नाही? या पैशांतून मुस्लिम, ख्रिश्नच लोकांचे सुद्धा कल्याण होते. 80 टक्के या गोष्टीसाठी रस्त्यावर का उतरत नाहीत? चर्च व मशिदीच्या पैशांवर सरकारचे का नियंत्रण नाही? असा सवालही शरद पोंक्षे यांनी यावेळी उपस्थित केला. सम्राट अकबराची भोंदू खरातशी तुलना शरद पोंक्षे यांनी यावेळी भोंदू अशोक खरातची तुलना मुगल सम्राट अकबराशीही केली. मुगल ए आझम चित्रपटातील अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठीच इतिहासात अस्तित्वात नसलेले जोधाचे पात्र त्यात घुसवण्यात आले. अकबर कसा चांगला असेल? तो बायकांचे आयुष्य बरबाद करणारा होता. 1 लाख अशोक खरात एकत्र केले, तर एक अकबर तयार होईल, असे ते म्हणाले. टीपू सुलतानवरही साधला निशाणा काँग्रेसने ब्राह्मणांची हत्या करणाऱ्या टिपू सुलतानची सीरियल दूरदर्शनवर दाखवली. त्यातून टिपू सुलतान किती चांगला होता हे आमच्यावर बोडक्यावर लादण्यात आले. अटकपासून कटकपर्यंत ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, त्याचे साम्राज्य पूर्ण केले तो बाजीराव पेशवा आपल्याला माहिती नाही. त्याची सीरियलही टीव्हीवर येत नाही. त्याचा चुकीचा इतिहास आणला. 41 लढाई कसे लढला, हे सुद्धा दाखवले जात नाही. मस्तानी फक्त 17 महिने त्यांच्या आयुष्यात आली. तेवढ्यावरच त्यांनी तिला आपल्या पत्नीचा दर्जा दिला, असेही शरद पोंक्षे यावेळी बोलताना म्हणाले.
अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेत धर्मातरांचा प्रकार झाला होता असे सांगितले नाही तर लैंगिक छळाचे प्रकरण झाले होते आणि या प्रकरणी रितसर चौकशी केल्याचे सांगितले. लैंगिक छळाबद्दलच बोलायचे झाले तर पाटकर फाईल्समध्ये तुम्ही एका महिलेबद्दल काय बोलला, त्यांच्यावर कसा अन्याय केला, हे पाटकर फाईल्समध्ये महाराष्ट्राने ऐकले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची टीसीएस प्रकरणी काय भूमिका आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये धर्मांतरणाचे प्रकरण सुरू आहे, त्यावर उद्धव ठाकरे मुक गिळून गप्प आहेत, त्यावर काहीच बोलत नाही. संजय राऊत उद्धव ठाकरेंना त्यावर बोलायला सांगा. प्रियांका चतुर्वेदींनी आरसा दाखवला नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आरसा दाखवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ट्विट बघण्यापेक्षा चतुर्वेदींनी केलेले ट्विट राऊतांनी बघितले तर त्यांचे डोळे उघडतील. महिला आरक्षणाचे समर्थन करण्याचे काम त्यांनी केले मी त्यांचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी नारी शक्तीच्या हिताची भूमिका घेतली. तुम्हाला महिलांबद्दल अभिमान वाटत नाही म्हणून तुम्ही विरोधात भूमिका घेतली. नारी शक्तीचा अपमान करण्याचे काम तुम्ही केले आहे, महिला तुम्हाला माफ करणार नाही. मोदी-शहा यांच्यात संघर्षाचा राऊतांचा दावा हास्यास्पद नवनाथ बन म्हणाले की, आम्ही भाजपमध्ये काम करतो. आमच्या पक्षात उबाठासारखे भांडणं नसतात. आम्ही देश प्रथम, मी पक्ष अशा भूमिकेतून काम करत असतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी- अमित शहा यांच्यात संघर्ष आहे असा हास्यास्पद आरोप राऊत करत आहे. तुमच्या पक्षात एकमेकांच्या विरोधात तुम्ही उभे राहतात. आमच्याकडे जनतेचे हित पाहिले जाते. उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष निर्माण करण्याचा डाव नवनाथ बन म्हणाले की, महिला आरक्षणाच्या निमित्ताने उत्तर VS दक्षिण संघर्ष इंडिया आघाडीला निर्माण करायचा आहे. विधेयकामुळे दक्षिणेतील राज्यावर अन्याय होणार नव्हता तर खासदारांची संख्या वाढणार होती. तुम्हाला देशाचे हित नको होते म्हणून तुम्ही या विधेयकाला विरोध केला आहे. दक्षिणेचे हित तुम्हाला नको असल्याचे काल दिसून आले. नारी शक्ती आणि दक्षिणेतील राज्य तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही महिलांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
मुंबई महापालिकेत झालेल्या 122 अभियंत्यांच्या बदल्यांवर अखेर पूर्णविराम देण्यात आला आहे. बदल्यांमध्ये कथित गैरव्यवहार आणि ‘ट्रान्सफर मार्केट’चे आरोप पुढे आल्यानंतर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला. ऑक्टोबर 2025 मध्ये या बदल्या करण्यात आल्या होत्या, मात्र सुरुवातीपासूनच या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अनेक तक्रारी, आक्षेप आणि चौकशीच्या मागण्यांमुळे हे प्रकरण सतत चर्चेत राहिले होते. या संपूर्ण वादानंतर महापौर रितू तावडे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि चौकशीची मागणी केली. त्यानंतर हे प्रकरण अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे सोपवण्यात आले. तपास आणि प्रशासनिक पडताळणीनंतर अखेर सर्व 122 अभियंत्यांच्या बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेच्या अंतर्गत कामकाजावर मोठा परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आणि भाजपचे मुंबई शहराध्यक्ष अमित साटम यांनी या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींनंतर तत्कालीन आयुक्त भूषण गगराणी यांनी तात्काळ हस्तक्षेप करत बदल्यांना स्थगिती दिली होती. त्यावेळीच या प्रकरणाची गंभीरता स्पष्ट झाली होती आणि पुढील कारवाईची दिशा ठरली होती. आता या बदल्या अधिकृतपणे रद्द केल्यामुळे महापालिकेतील बदली प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे हा निर्णय भ्रष्टाचाराविरोधातील कठोर कारवाई म्हणून पाहिला जात आहे, तर दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल्या रद्द होणे म्हणजे प्रशासनातील अनियमिततेची कबुली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पारदर्शकतेबाबत प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या निर्णयामुळे महापालिकेत चालणाऱ्या कथित ‘बदल्यांच्या बाजाराला’ मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. अनेक स्तरांवरून या प्रकरणाची चौकशी व्हावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे. यामुळे प्रशासनातील विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बदली प्रक्रिया स्वतंत्र समितीमार्फत राबवण्याची मागणी दरम्यान, भविष्यात अशा प्रकारच्या वादांना आळा घालण्यासाठी बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि स्वतंत्र समितीमार्फत राबवण्याची मागणी जोर धरत आहे. नियमबद्ध आणि स्पष्ट निकषांवर आधारित बदली प्रणाली लागू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिका प्रशासन कोणती नवी पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही महिलांना एक तृतीयांश आरक्षण देणारी 131 वी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याच्या मुद्यावरून विरोधकांवर संताप व्यक्त केला आहे. कालचा दिवस भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत लाजिरवाणा ठरला. महिला सक्षमीकरणाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनीच महिलांच्या हक्कावर घाला घातला. यावरून विरोधकांची महिला विरोधी मानसिकता पुन्हा एकदा उघड झाली, असे त्या म्हणाल्यात. महिला आरक्षण व लोकसभेच्या जागा वाढवण्याशी (परिसीमन) संबंधित अत्यंत महत्त्वाचे असणारे संविधान दुरुस्ती विधेयक शुक्रवारी लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. प्रदीर्घ चर्चेनंतर पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत सरकारला हे विधेयक पारित करण्यासाठी आवश्यक असणारे दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यात अपयश आले. परिणामी, बहुमताअभावी हे विधेयक फेटाळले गेले. त्यानंतर आता सत्ताधारी पक्षांनी विरोधी पक्षांवर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणी विरोधकांवर निशाणा साधला आहे. महिला आरक्षणाची लढाई इथे थांबणार नाही - सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार म्हणाल्या, कालचा दिवस आपल्या भारतीय लोकशाहीसाठी लाजिरवाणा ठरलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाहीय. महिलांना 1/3 आरक्षण देणारं 131 वं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकलं नाही तथापि जाणीवपूर्वक होऊ दिल नाही आणि विरोधकांची महिला-विरोधी मानसिकता पुन्हा उघडी पडली. महिला सशक्तीकरणाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनीच महिलांच्या हक्कावर घाला घातला. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या एकत्र येण्याच्या आवाहनाला नकार हा अहंकार नव्हे तर देशातील महिलांवर केलेला अन्यायचं आहे. पण महिला आरक्षणाची लढाई इथे थांबणार नाही… नारीशक्ती उत्तर देईल, असे त्या म्हणाल्या. डीलिमिटेशन विधेयक अत्यंत घातक - रोहित पवार दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी लोकसभेने हे विधेयक फेटाळून लावण्याचे स्वागत केले आहे. या प्रकरणी त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, महिला आरक्षण विधेयकाच्या अडून केंद्र सरकारने चालवलेले घातक डिलिमिटेशन बिल हाणून पाडण्यात आले. या डिलिमिटेशन मुळे दक्षिणेतील राज्यांवर होणारा अन्याय ओळखण्याचे काम दक्षिणेतील जागृत पक्षांनी केलं. TDP पक्षाने मात्र केवळ आपल्या राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांसाठी आंध्र प्रदेशच्या जनतेशी धोका करण्याचं काम केलं. दक्षिणेवर अन्यायकारक असलेल्या डिलिमिटेशनच्या बाजूने मतदान करण्याचं काम TDP कडून झालं हे दुःखद आहे. TDP पक्षाने पुन्हा एकदा दाखवून दिले की त्यांच्यासाठी प्रादेशिक अस्मिता नव्हे तर सत्ता आणि आर्थिक हितसंबंध महत्वाचे आहेत. सोबतच अजित दादांच्या अपघातास कारणीभूत असलेल्या VSR कंपनीसोबत TDP चे आर्थिक हितसंबंध असल्याने केंद्राच्या दबावाखाली TDP पक्षाकडून डिलिमिटेशन बिलाला समर्थन दिलं गेलं असावं. असो, ज्या प्रादेशिक अस्मितेसाठी सत्ता मिळवली तीच अस्मिता दिल्लीच्या पायावर ठेवण्याचं पाप TDP पक्षाकडून झालं हे मात्र नक्की, असे रोहित पवार म्हणाले.
ज्या खासदारांनी काल महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान केले त्या खासदारांना कधीच निवडणूक जिंकता येणार नाही, त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. बहिणींना प्रतिनिधित्व मिळू नये म्हणून हा विरोध करण्यात आला, काँग्रेसने कधीही महिलांना सन्मान दिला नाही, असे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तर महिलांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या सर्वांना महाराष्ट्रातील आणि देशाची जनता उद्ध्वस् करेल. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अमरावती अत्याचार प्रकरणी मी आज पोलिस अधीक्षकांसोबत चर्चा करणार आहे. माझे त्या प्रकरणाकडे लक्ष आहे. या प्ररकणी सखोल तपास करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. पोलिसांना तपास करण्यासाठी काही गोष्टींची गरज लागणार आहे का? या चर्चा करणार आहे. चौकशी भरकटेल असे विधान कोणीही करू नये, या प्रकरणर 7 मोबाईल पकडले गेले आहेत. महिलांना प्रतिनिधित्व मिळू नये म्हणून विरोधात मतदान चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काल काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी लोकसभेमध्ये नारी शक्ती विधेयकाला प्रचंड विरोध केला. त्या विधेयकाच्या विरोधात मतदान केले, काँग्रेसचे महिलाविरोधी धोरण आहे. काँग्रेसने कधीही महिलांना सन्मान दिला नाही हे दिसून आले. ज्या खासदारांनी विरोधात मतदान केले त्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघासह देशभरातील महिला बहिणी त्यांची वाट लावतील. महिलांना 33 टक्के आरक्षण देत विकसित भारतामध्ये महिलांचे स्थान असावे यासाठी मोठा निर्णय घेतला. या निर्णयाला विरोध केला. यापूर्वी देखील त्यांनी तेच केले आहे. आमच्या 70 कोटी महिलांना प्रतिनिधित्व मिळू नये यासाठी मतदान केले आणि विधेयक मंजूर झाले नाही म्हणून आनंद उत्सव केला. हा महिलांचा अपमान आहे. यामुळे जनता त्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. जनता विरोधकांना धडा शिकवेल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रात 72 खासदार झाले असते तर 33 टक्के महिला खासदार झाल्या असत्या. आणि जवळपास साडेतीनशे आमदार झाले असते तर 150 पर्यंत महिला आमदार झाल्या असत्या, त्यांना प्रतिनिधित्व मिळू शकणार नाही. यांना जनता आणि महिला धडा शिकवेल. जर लोकसभेच्या सीट वाढल्या असत्या तर आमच्या बहिणींच्या सीट वाढल्या असत्या. एससी, एसटीच्या जागा वाढल्या असत्या. देशातील अनेक मोठ्या मतदारसंघात जनतेला न्याय देण्यासाठी खासदार वाढले असते. कारण काही मतदारसंघात 40 लाख मतदार आहे, त्यांना मतदारांपर्यंत जाता येत नाही. छोटे मतदारसंघ झाले तर लोकांना भेटता आले असते. खासदारांशी सध्या संपर्क होऊ शकत नाही, हे दोन्हीही विषय महत्त्वाचे होते.
राज्यात सध्या हवामानाचा विलक्षण आणि चिंताजनक बदल पाहायला मिळत आहे. एका बाजूला तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून अनेक ठिकाणी तो 40 अंशांच्या पुढे गेला आहे, तर दुसऱ्या बाजूला काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या दुहेरी परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांसह विशेषतः शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत होत असतानाच अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती वाढली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा कहर अधिकच तीव्र झाला आहे. अकोला येथे 44.1 अंश तापमानाची नोंद झाली असून, वर्धा 44.4, नागपूर 44, गडचिरोली 44 आणि अमरावतीतही 44 अंशांच्या आसपास तापमान पोहोचलं आहे. यवतमाळमध्ये 42.8, चंद्रपूर 43.6, गोंदिया 42.9 आणि भंडारा 42 अंशांवर पोहोचले आहे. या तीव्र उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून उष्माघाताचा धोका वाढला आहे. राज्यातील इतर भागांमध्येही तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. सांगलीमध्ये 41.5, जळगाव 42.3, परभणी 41.8, सातारा 40.8, पुणे 40.3 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 41.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये 38.4, ठाणे 37 आणि माथेरानमध्ये 36 अंश तापमान आहे. या वाढत्या उष्णतेचा परिणाम जनजीवनावर स्पष्टपणे जाणवू लागला असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. दरम्यान, उष्णतेच्या या लाटेसोबतच राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात सुमारे 1 तास पाऊस कोसळला. शहरातही अचानक पावसाची सर आली. काही दिवसांच्या तीव्र उकाड्यानंतर पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी शेती पिकांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. वीज कोसळून तरुणाचा मृत्यू या अवकाळी पावसादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. मोहोळ तालुक्यातील आढेगाव येथे वीज कोसळून विजय राजाराम डोंगरे या तरुणाचा मृत्यू झाला. बांधकामासाठी आलेल्या वाळूच्या ट्रकजवळ असताना अचानक वातावरण बदलले आणि विजेचा कडकडाट सुरू झाला. त्याचवेळी वीज कोसळून तो गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उष्णता आणि अवकाळी पावसाचा दुहेरी फटका दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातही उष्णतेचा तडाखा वाढला असून तापमान 41 अंशांवर पोहोचले आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरावरही दिसून येत आहे. भाविकांची संख्या कमी झाली असून संस्थानने भाविकांसाठी मंडप, गालिचे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. एकूणच, राज्यात उष्णता आणि अवकाळी पावसाचा दुहेरी फटका बसत असल्याने शेतकरी आणि नागरिक दोघेही मोठ्या चिंतेत सापडले आहेत. सोलापूर आणि धाराशिवसाठी 24 तासांसाठी यलो अलर्ट मध्य महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील काही तासांत हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्वमोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर या भागांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः सायंकाळनंतर काही ठिकाणी जोरदार वारे वाहू शकतात. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या बदलत्या परिस्थितीमुळे सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी दरम्यान, 18 ते 20 एप्रिल या कालावधीत राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्येही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू शकतात. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राच्या सीमेलगतही वाऱ्यांची चक्राकार स्थिती हवामानातील या बदलामागे वातावरणातील विशिष्ट घडामोडी कारणीभूत ठरत आहेत. सध्या समुद्र सपाटीपासून सुमारे दीड किलोमीटर उंचीवर, मध्य प्रदेशच्या ईशान्य भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. हे वारे मराठवाडा आणि विदर्भातून पुढे सरकत असून, त्याचबरोबर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेलगतही वाऱ्यांची चक्राकार स्थिती स्थिरावलेली आहे. या सर्व घटकांमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. 19 एप्रिल रोजी सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर 20 एप्रिल रोजी अहिल्यानगर, पुणे, सातारा, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट लागू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
मोदी है तो मुमकीन है ही आता दंतकथा झाली आहे. फार तर आता मोदी है तो नमकीन है असे म्हणू शकतात. कारण ते नमकीन भाषणे करतात आणि त्यांचे लोकं जीभ चाटत टाळ्या वाजवतात. अमित शहा यांनी काल विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपमानित करण्यासाठी आणले काय? आम्ही दोन-तृतीयांश मते जमा करू शकत नाही, भाजपकडे स्वत:चे बहुमत नसताना हे भोंदू बिल लोकसभेत आणले, त्यांचा मुळ उद्देश 543 जागा वाढवून 850 करायच्या आणि सत्तेचा अमर पट्टा बांधत सतत विजय मिळवण्यासाठी हे बिल होते, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, भविष्यात बेकायदेशीरपणे विजय मिळवता यावे यासाठी 850 जागा महिलांच्या नावाने वाढवायचा हा हेतू होता. सत्ताधाऱ्यांना देशात वाद पेटवायचा होता. 2023 मध्ये मंजूर केलेल्या बिलाला 543 मध्येच 33 टक्के आरक्षण देण्यास आम्ही पाठिंबा दिला होता. पण केवळ सत्तेतील खासदारांच्या सीट वाचवण्यासाठी हे बिल आणले होते ते आम्ही उधळून लावले. या विधेयकानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी VS अमित शहा संघर्ष पाहायला मिळाला. पहिले ही चर्चा दबक्या आवजात सुरू होती. पण आता लोकसभेच्या पटलावर दिसून आले. महिला आरक्षण विधेयक पडलेले नाही ते 2023 मध्ये मंजूर झालेले आहे. 16 महिन्यामध्ये 16 नंबर मोदींना घरी बसवेल असा दावाही राऊतांनी केला आहे. भाजप हा भोंदू पक्ष संजय राऊत म्हणाले की, आम्ही महिला आरक्षणाच्या विरोधात नाही, कुणीच केला नाही. कारण 2023 मध्ये हे महिला आरक्षणाचे बिल पास झाले आहे. भाजप हा पक्ष भोंदू आहे, त्यांनी देशात आणि राज्यात अनेक भोंदू तयार केले आहेत, ते भोंदू प्रकारचे विचार आणतात. भविष्यातील राजकारणात 16 आकडा धोक्याचा आहे. तेव्हा अमृता फडणवीस गप्प का बसल्या? संजय राऊत म्हणाले की, अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बॅकेत जर असे प्रकरण घडले असेल तर तेव्हा शांत का बसल्या? त्यांनी तक्रार दाखल का केली नाही. त्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या पत्नी आहेत, त्या शांत का बसल्या असा प्रश्न जनता विचारू शकते, असे राऊतांनी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना म्हटले आहे. हे जनतेचे यश संजय राऊत म्हणाले की, काल विधेयक मंजूर झाले नाही हे काही विरोधी पक्षाचे यश नाही हे जनतेचे यश आहे. हा देशातील महिलांचा विजय आहे. महिलेच्या नावाने जी फसवणूक सुरू होती आम्ही त्या विरोधात मतदान केले. आम्ही काही महिला आरक्षणाच्या विरोधात नाही, पण हे बिल 2023 मध्येच मंजूर झाले, आता जे खासदार आहेत. त्यापैकी 33 टक्के जागा राखीव कराव्या. देशातील महिला आमच्यासोबत आहे. महिलांना पैसे देऊन त्यांचे मत विकत घेतात. ते पैसे देणं बंद करा मग महिला कोणासोबत आहे ते तुम्हाला समजेल.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात भोंदूगिरीचा मोठा पर्दाफाश झाला असून, दत्तधाम सरकार नावाने दरबार भरवणाऱ्या राजेंद्र गडगे याला पोलिसांनी अटक केली आहे. मंत्रोच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली गंभीर आजार बरे करण्याचा दावा करत सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. संगमनेर पोलिसांनी ही कारवाई करत या प्रकरणातील मुख्य आरोपीला गजाआड केले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वडगावपान परिसरात राजेंद्र बापू गडगे हा स्वतःला दैवी शक्ती लाभलेला असल्याचे भासवत होता. त्याने दत्तधाम सरकार या नावाने यूट्यूब चॅनल सुरू करून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोच निर्माण केली होती. कर्करोगासारख्या दुर्धर आजारांवर मंत्रशक्तीने उपचार करतो, निःसंतान महिलांना मूलप्राप्ती करून देतो आणि घरातील अडचणी दूर करतो, असे भ्रामक दावे करून तो लोकांना आकर्षित करत होता. या आमिषाला भुलून अनेक नागरिक त्याच्या दरबारात येत असल्याचे तपासात समोर आले आहे. तपासादरम्यान उघडकीस आलेल्या माहितीनुसार, गडगे हा आपल्या तथाकथित उपचारांसाठी मोठ्या रकमेची मागणी करत असे. 15 हजार, 21 हजार ते अगदी 51 हजार रुपयांपर्यंत पैसे घेतल्याचे समोर आले आहे. उपचाराच्या नावाखाली तो रुग्णांना साधे वनस्पतीजन्य पदार्थ देत असे, ज्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी गंभीर खेळ होत होता. गेल्या सुमारे दहा वर्षांपासून त्याने शेकडो लोकांची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक फसवणूक केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीमुळे झाला. समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर संगमनेर तालुका पोलिसांनी कारवाई करत राजेंद्र गडगेसह त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, डॉ. मोहन पुरी, सुरज शिंदे आणि मधुकर शिंदे या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा छापा टाकून राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे या दोघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणात आरोपींवर विविध कठोर कायद्यांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जादूटोणा विरोधी कायदा, आयटी ॲक्ट, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांचा समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बनावट व्हिडिओ तयार करून लोकांची दिशाभूल केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे आणखी गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फसव्या दाव्यांना बळी न पडण्याचे आवाहन सध्या या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींच्या जाळ्याचा विस्तार किती मोठा आहे याचा शोध घेतला जात आहे. तसेच या प्रकरणात आणखी किती लोक फसले आहेत, याचाही तपास सुरू आहे. या कारवाईमुळे भोंदूगिरीविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, नागरिकांनी अशा फसव्या दाव्यांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला असून, तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे नवे आणि धक्कादायक तपशील समोर येत आहेत. या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी स्वतः तपासाचा रोज आढावा घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात अधिक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुरुवातीला काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही अनेक महिला बदनामीच्या भीतीने पुढे येण्यास तयार नव्हत्या. मात्र, पोलिसांनी महिलांची ओळख गोपनीय ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. आता महिलांनी धैर्याने पुढे येत तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष हेल्पलाईनवर दररोज 5 ते 6 कॉल येत असून, मागील 23 दिवसांत शेकडो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याचेही समोर आले आहे. या तक्रारींमध्ये केवळ फसवणूक किंवा विश्वासघातच नाही, तर दबाव टाकून गैरप्रकार केल्याचेही आरोप आहेत. त्यामुळे पोलिसांचा तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे. आतापर्यंत अशोक खरातविरोधात विविध कलमांखाली 15 गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी 8 गुन्हे महिलांवरील अत्याचाराशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हेल्पलाईनवर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 40 जणांचे जबाब साक्षीदार म्हणून नोंदवले आहेत, ज्यामुळे या प्रकरणात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीही आक्रमक झाली आहे. श्याम मानव यांच्या नेतृत्वाखाली अकोला येथे बुवाबाजी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यासोबतच राज्यभर अशाच प्रकारच्या जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. अंधश्रद्धेविरोधात कठोर कारवाई व्हावी आणि जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अंनिसचे महासचिव हरीश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. आज न्यायालयात हजर केले जाणार अशोक खरातविरोधातील महिला अत्याचार प्रकरणातील चौथ्या गुन्ह्याची पोलिस कोठडी आज संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांकडून आता पाचव्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत आणखी महत्त्वाचे टप्पे गाठले जाणार आहेत. सरकारी पक्षाकडून नवे मुद्दे मांडले जाण्याची शक्यता दरम्यान, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि एसआयटीने संयुक्त कारवाई करत खरातच्या कार्यालयावर छापा टाकला असून, महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या पुराव्यांच्या आधारे आजच्या सुनावणीत सरकारी पक्षाकडून नवे मुद्दे मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीची घोषणा होताच सत्ताधारी शिवसेना शिंदे गटामध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 12 मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात उमेदवारीबाबत रणनीती आखली जात असून, पहिला उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपत आल्याने त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील विश्वासू आणि अनुभवी चेहरा म्हणून त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे पहिल्या जागेवर शिंदे गटाकडून स्थैर्य राखण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. मात्र, दुसऱ्या जागेवरून चित्र अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. दुसऱ्या जागेसाठी पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दीपक सावंत यांसारखी अनेक नावे चर्चेत आहेत. या सर्वांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस वाढली असून, शिंदे कोणावर विश्वास दाखवतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रयोग केल्यानंतर, विधानपरिषदेतही अशाच प्रकारचा धक्कातंत्र वापरला जाईल का, याची चर्चा सुरू आहे. विधानपरिषद निवडणुकीत एका उमेदवाराला विजयासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. शिवसेना शिंदे गटाकडे विधानसभेत 57 आमदारांचे संख्याबळ असल्याने दोन जागा जिंकण्यात कोणतीही अडचण नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षांतर्गत समीकरणे, निष्ठा आणि भविष्यातील राजकीय रणनीती या गोष्टींना अधिक महत्त्व दिले जाणार आहे. याचदरम्यान, शिंदे गटात भाकरी फिरणार, असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. काही मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त होत असून, त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक आमदारांनी आपल्या भागातील कामे होत नसल्याची तक्रार केली असून, मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. धाराशिव आणि सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या नाराजीचे स्वरही उघडपणे समोर आले होते. अंतर्गत बदलांची सुरुवात या पार्श्वभूमीवर, येत्या काही दिवसांत शिंदे कोणत्या मंत्र्यांना डच्चू देतात आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानपरिषद निवडणूक केवळ सदस्य निवडण्यापुरती मर्यादित न राहता, शिंदे गटातील अंतर्गत बदलांची सुरुवात ठरू शकते. त्यामुळे या निवडणुकीत घेतले जाणारे निर्णय आगामी राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
शालार्थ घोटाळा:चव्हाणची ‘माया’ डोळे दिपवणारी, नाशिकचा निलंबित शिक्षण उपसंचालक संभाजीनगरचा रहिवासी
नाशिक विभागात उघडकीस आलेल्या शालार्थ घोटाळ्यातील आरोपी शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलतानपूर (ता. खुलताबाद) येथील रहिवासी आहे. एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या चव्हाण याने अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली. चव्हाण आणि त्याच्या पत्नीने विविध व्यावसायिक फर्म तयार केल्या. यात दोन कंपन्या देखील आहेत. केवळ नोकरी करत असताना मिळालेल्या वेतनाच्या आधारे हे डोळे दिपवणारे साम्राज्य उभे करणे निव्वळ अशक्य आहे. बी. बी. चव्हाण याच्या नोकरीचा बहुतांश कार्यकाळ छत्रपती संभाजीनगर विभागातच गेला. शिक्षक, विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी, सहायक शिक्षण संचालक आणि उपसंचालक असा त्याचा नोकरीतील प्रवास आहे. तो नाशिक येथे उपसंचालक पदावर कार्यरत होता. शालार्थ घोटाळ्यातील सहभागामुळे सध्या तो निलंबित असून फरार आहे. कबीर कोर्ट हॉटेल, तिसगाव सिडको महानगरात रेशीमबंध मंगल कार्यालयाजवळच कबीर कोर्ट हॉटेल आहे. इथे फूड कोर्ट, भव्य असा बँक्वेट हॉल आहे. लग्न, स्वागत समारंभ, वाढदिवस अशा कार्यक्रमांसाठी येथील बँक्वेट हॉल भाड्याने दिला जातो. तारखेनुसार आणि सीझननुसार त्याचे भाडे आकारले जाते. काय आहे चव्हाणचे नाशिक प्रकरण? चव्हाणने शालार्थ आयडी घोटाळ्याच्या माध्यमातून शासनाला कोट्यवधींचा चुना लावल्याचा आरोप आहे. नाशिक विभागातील साडेआठशे शिक्षकांच्या मान्यता बोगस असल्याचे एसआयटीने उघड केल्यानंतर चव्हाणसह अन्य अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. तेव्हापासून चव्हाण पसार आहे. नाशिक पोलिस सध्या त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या मालमत्तांचीही चौकशी केली जात आहे. मकोका कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव शालार्थ आयडी प्रकरणात निवृत्त शिक्षण उपसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कट रचून केलेली संघटित गुन्हेगारी असल्यामुळे नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बी. बी. चव्हाणसह अन्य अधिकाऱ्यांवर मकोका कायद्यानुसार कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. रेशीमबंध मंगल कार्यालय, वाळूज सिडको महानगरजवळ अत्यंत प्रशस्त असे हे रेशीमबंध मंगल कार्यालय आहे. एका कार्यासाठी प्रतिदिन सुमारे ७५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंतचे भाडे आकारले जाते. जवळपास १० हजार चौरस फूट जागेत हे मंगल कार्यालय आहे. भद्रा ब्रीडिंग फार्मसाठी घेतले २ कोटी अनुदान सुलतानपूर येथे अत्याधुनिक भद्रा ब्रीडिंग फार्म आहे. येथे गीर, जर्सी आणि होल्स्टिन फ्रिजिएन, गिरलँडो जातीच्या तब्बल ७०० गायी आहेत. या फार्मसाठी केंद्र सरकारच्या गोकुळ मिशनमधून २ कोटींचे अनुदान घेतले आहे. येथे परदेशी गोवंशाच्या सिमेनद्वारे ॲम्ब्रियो ट्रान्सफर केले जाते. या आयव्हीएफ तंत्राद्वारे तयार झालेल्या कालवडी एक ते सव्वा लाखांपर्यंत विक्री केल्या जातात. इथॉस मिल्क फूड प्रायव्हेट लिमिटेड इथॉस मिल्क फूड प्रा.लि. कंपनी बी. बी. चव्हाण याची पत्नी वैशाली चव्हाण व मुलगी फाल्गुनी चव्हाण यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. बीड बायपासलगत मुस्तफाबाद या पत्त्यावर ही कंपनी दाखवलेली आहे. गतवर्षीच या कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. दूध आणि दुधापासून तयार केलेले उपपदार्थ या कंपनीद्वारे उत्पादित आणि विक्री केले जातात. बी. बी. चव्हाण मिलिटरी स्कूल अँड अकॅडमी खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव येथे ही अकॅडमी आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पॅरा मिलिटरी सर्व्हिसेसची पूर्वतयारी करवून घेणारी शैक्षणिक संस्था आहे. निवासी स्वरूपाची ही अकॅडमी असून इथे सातवी ते बारावीपर्यंतचे शिक्षणदेखील दिले जाते. एका विद्यार्थ्याकडून तब्बल २ लाख रुपयांपर्यंत फीस घेतली जाते. मालोजीराजे कृषी उत्पादक कंपनी २०१८ मध्ये ही कंपनी स्थापन केलेली आहे. यामध्ये भाऊसाहेब चव्हाण याची पत्नी वैशाली चव्हाण, मेहुणा उमेश निकम व अन्य नातलगांचा समावेश आहे. वैशाली चव्हाण या शिक्षिका असतानाही त्या या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालक म्हणून काम पाहतात, हे विशेष.
पुणे विमानतळाची धावपट्टी (रनवे) शुक्रवारी रात्री उशिरा एका IAF विमानाने केलेल्या हार्ड लँडिंगनंतर तात्पुरती बंद करण्यात आली होती. या घटनेमुळे विमानतळावरील विमान वाहतूक (फ्लाइट ऑपरेशन) 8 तास प्रभावित झाली. भारतीय वायुसेनेने स्वतः ही माहिती दिली. IAF नुसार, विमानाने लँडिंग करताना झालेल्या घटनेनंतर, सुरक्षा कारणांमुळे धावपट्टी (रनवे) तात्काळ बंद करावी लागली. विमानातील कर्मचारी (क्रू) सुरक्षित आहेत. कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. तथापि, विमानतळावरील विमान वाहतूक सकाळी 7.30 वाजल्यानंतर सामान्य होऊ शकली. विमानतळ संचालकांच्या मते, 5 एअरलाईन्सची 91 विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली होती. रद्द झालेल्या विमानांमध्ये इंडिगोची 65, एअर इंडियाची 6, स्पाइसजेटची 5, अकासा एअरची 5 आणि एअर इंडिया एक्सप्रेसची 10 विमाने समाविष्ट होती. विमानतळ संचालकांच्या मते, दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर सकाळी 7:30 वाजल्यापासून उड्डाणे सुरू झाली आहेत. दिवसभरात कामकाज (ऑपरेशन) सामान्य होईल. खरं तर, पुणे विमानतळ दुहेरी वापर मॉडेलवर काम करते, ज्यात नागरी व्यावसायिक उड्डाणांसोबतच एक सक्रिय वायुसेना स्टेशन ऑपरेशन देखील समाविष्ट आहे. वायुसेनेच्या विमानाचे लँडिंग गियर खराब न्यूज एजन्सी पीटीआयनुसार, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री सुमारे २२:२५ वाजता लढाऊ विमान लँडिंग करणार होते. यावेळी त्याचे 'अंडरकॅरेज' (लँडिंग गियर) खराब झाले होते, ज्यामुळे ते धावपट्टीवर आदळले. मात्र, हे कोणते फायटर जेट होते, याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. ना त्याचे व्हिज्युअल उपलब्ध आहेत. काय असते हार्ड लँडिंग सामान्यतः धावपट्टीवर लँडिंग करताना विमान हळू हळू आणि सहजपणे उतरते. पण जर ते धावपट्टीवर जोरात आदळले किंवा वेगाने खाली आले तर त्याला हार्ड लँडिंग म्हणतात. हार्ड लँडिंगची अनेक कारणे असू शकतात, यात खराब हवामान (वेगाने वाहणारे वारे, वादळ), पायलटच्या गणनेत चूक किंवा अचानक हवेचा दाब बदलणे यांचा समावेश आहे. हार्ड लँडिंगच्या वेळी कधीकधी फक्त धक्काच लागतो, पण तीव्रता जास्त असल्यामुळे विमानाला नुकसान होऊ शकते. त्यात बसलेल्या प्रवाशांना आणि क्रूला दुखापती होऊ शकतात.
दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:ज्या शाळेने दिले 7 पोलिस, 1 सैनिक, ती आज भरतेय फक्त एका विद्यार्थ्यासाठी
१९६७ सालची गोष्ट... लामकाना तांड्यावर एक जिल्हा परिषद शाळा सुरू झाली. जवळपास २५० घरांचा हा गजबजलेला तांडा. या शाळेत शिकलेली मुलं पुढे मोठी झाली. याच मातीत घडलेले ७ तरुण पोलिस झाले, एक जण आर्मीत गेला, तर दोघे रेल्वेत रुजू झाले. शाळेचा नावलौकिक वाढत होता. पण काळ बदलला, विकासाची गंगा शहरात आली, मात्र लामकाना तांड्यापर्यंत पोहोचलीच नाही. आज ५९ वर्षांनंतर या शाळेची अवस्था अशी आहे की, पूर्ण तांड्यातून फक्त आर्यन नावाचा एकुलता एक विद्यार्थी पहिल्या वर्गात बसतो आणि शिक्षक केवळ त्यालाच शिकवण्यासाठी रोज डोंगर-दऱ्या पार करून येतात. ही कथा फक्त एका शाळेची नाही, तर व्यवस्थेने वाऱ्यावर सोडलेल्या एका गावाची आहे. शहरापासून लामकाना तांडा केवळ ३२ ते ३५ किमीवर आहे. मुख्य रस्ता संपल्यावर दोन किलोमीटरची नुसती खडबडीत पायवाट सुरू झाली. पुढे गेल्यावर एक सुकलेलं तळं लागलं. सुदैवाने पाणी कमी असल्याने तळ्यातून वाट काढत शाळेपर्यंत पोहोचलो. आजूबाजूला घनदाट डोंगर आणि एका उंच टेकडीवर ही शाळा. वर्गात डोकावून पाहिलं तर एका रिकाम्या बाकावर चिमुकला आर्यन एकटाच बसला होता आणि शिक्षक त्याला धडे गिरवायला लावत होते. हे दृश्य मनाला चटका लावून जाणारं होतं. विचारपूस केल्यावर समजलं की रस्ता आणि पाण्याअभावी २५० घरांचा हा तांडा आता जेमतेम ५० घरांवर येऊन ठेपला आहे. या स्थलांतराचा शाळेच्या पटसंखेवर परिणाम झाला आहे. ‘मी पहिलीत शिकतो, वर्गात मित्रच नाहीत!’ “मी पहिल्या वर्गात शिकतोय. वर्गात शिकताना मला कुणाशी तरी बोलावंसं वाटतं, खेळायला जावंसं वाटतं, पण माझ्या वर्गात कुणीच मित्र नाही” - आर्यन राठोड, विद्यार्थी. आधी रस्ता तर द्या, मुलं शाळेत येतील “इथूनच शिकून मुलं पोलिस, आर्मीत लागली. आम्ही मजुरी करून मुलांना शिकवू, पण गावात रस्ता आणि सुविधा तर मिळाली पाहिजे. - रामसिंग राठोड, माजी विद्यार्थी. मुलांना आणण्याचा प्रयत्न करणार ग्रामस्थांशी संवाद साधून पटसंख्या वाढवण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. गरज पडल्यास स्वतःचे वाहन लावून विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्याचा निर्णय घेतला आहे. - ज्ञानेश्वर पठाडे, शिक्षक स्थलांतराचा फटका शिक्षणाला या बातमीचा सर्वात मोठा पैलू हा आहे की, ही शाळा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अनास्थेमुळे ओस पडलेली नाही तर ‘प्रशासकीय सुस्ती’मुळे पडली आहे. राज्यभरात कमी पटाच्या ८०० शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. लामकाना तांड्याची शाळाही त्याच उंबरठ्यावर आहे. डोंगराळ भाग, पिण्याचे पाणी नाही, वीज नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जाण्यासाठी साधा रस्ता नाही. त्यामुळे येथील ऊसतोड कामगार आणि मजुरांनी दुसऱ्या गावात स्थलांतर केले आहे. परिणामी, गेल्या वर्षी ६ असलेली विद्यार्थी संख्या या वर्षी थेट एकवर आली आहे. अधिकाऱ्यांच्या वाऱ्या प्रशासकीय यंत्रणेतील उणिवा इथे स्पष्ट दिसतात. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक अधिकारी येतात, पाहणी करतात आणि निघून जातात. कोणत्याही ठोस सुविधा दिल्या जात नाहीत. गावात साधा दवाखाना नाही. जर ही शाळा बंद पडली तर तांड्यावरील उरल्यासुरल्या लेकरांना शिक्षणासाठी तब्बल ४ किलोमीटर पायपीट करावी लागेल, जी लहान मुलांसाठी शक्य नाही.
महिला आरक्षण विधेयकावरून देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असताना, ठाकरेंच्या शिवसेनेतही अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. संसदेत महिला आरक्षणाशी संबंधित 131व्या घटनादुरुस्ती विधेयकाला आवश्यक असलेला दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने ते नामंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मते पडली. त्यामुळे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठा धक्का बसला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या माजी राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याचे समोर आले. मात्र, प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्षाच्या भूमिकेला विरोध करत या विधेयकाचे उघड समर्थन केले. विधेयक मंजूर न होणे हा भारतीय लोकशाहीसाठी दु:खद दिवस असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. संसदेत किंवा विधानसभेत प्रवेश करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी ही मोठी निराशाजनक बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रियांका चतुर्वेदी यांनी आपली भूमिका अधिक ठाम करत, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर मी सातत्याने समर्थन करत राहणार असल्याचे सांगितले. मी स्वतःला इतरांच्या सोयीनुसार बदलणार नाही. कोणाला माझी भूमिका मान्य नसेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी मत व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून त्यांनी दूर जात स्वतःचा वेगळा मार्ग निवडल्याचे दिसून येत आहे. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रियांका चतुर्वेदी या ठाकरे गटात नाराज आहेत का, आणि त्या पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यांच्या या भूमिकेला पहिलं बंड म्हणून पाहिले जात असून, भविष्यात त्या नव्या राजकीय पर्यायाचा विचार करू शकतात, अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, प्रियांका चतुर्वेदी यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ नुकताच संपला होता. पुन्हा एकदा राज्यसभेत जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र, महाविकास आघाडीने शरद पवार यांना एकमताने राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची संधी हुकली. यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा आधीपासूनच होती. चतुर्वेदी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात याच पार्श्वभूमीवर, प्रियांका चतुर्वेदी या भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेत पाठवण्यासाठी प्रयत्न केल्याचे बोलले जात असले, तरी अंतिम निर्णयात त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे आता पुढील राजकीय वाटचालीसाठी त्या कोणता मार्ग निवडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतीय सुवर्णयुगाचे शिल्पकार सम्राट अशोक यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा देणाऱ्या राज्यस्तरीय अशोक पर्व महोत्सवा'त यंदा एक विशेष आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येत आहे. या महोत्सवात तब्बल ५०० भारतीय संविधानाच्या प्रतींचे वितरण करण्यात येणार असून, हा उपक्रम समाजात वाचन संस्कृती व संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अकोला येथे २९ एप्रिल रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ‘अशोक पर्व’ महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील भवनसुंदर वानखडे यांचा हा उपक्रम असून त्यांनी ५०० संविधान प्रतींचे दान देत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. सामाजिक, धार्मिक उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असलेले भवनसुंदर वानखडे हे वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि महापुरुषांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने नेहमीच पुस्तक दानाचे कार्य करीत असतात. महोत्सवाच्या निमित्ताने भगवान बुद्ध, महापुरुषांची चरित्रे आणि भारतीय संविधान यांचे वितरण करण्यात येणार असून, हा कार्यक्रम अकोला येथे पार पडणार आहे. या उपक्रमामुळे युवकांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे. दरम्यान, या उल्लेखनीय कार्याबद्दल अशोक पर्व आयोजन समितीकडून भवन सुंदर वानखडे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. संविधानाच्या ५०० प्रतींचे दान स्वीकारताना अशोक पर्व महोत्सव समितीने भवनसुंदर वानखडे यांचे आभार व्यक्त करून सन्मानही करण्यात आला. याप्रसंगी प्रा. विजय आठवले, डॉ. प्रा. बाळकृष्ण खंडारे, प्रा. सुनील कांबळे, अनिल गवई, प्रा. शैलेश इंगळे, विद्याधर मोहोड, सुमेध घनबहादूर, संदेश गवई, प्रा. विवेक पांडे, प्रा. सज्जन जाधव आदी उपस्थित होते. निबंध स्पर्धेसाठी दोन गट ठेवण्यात आले आहेत. पहिला गट १० ते १८ वर्षाचा असून यात सम्राट अशोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध यांच्या विचारांवर आधारित विषय आहेत. १८ वर्षांवरील खुला गटात संविधान, लोकशाही, सामाजिक परिवर्तन, मानवता व धम्मविजय यांवरील विषय आहेत. सम्राट अशोक यांचा संविधानिक मूल्यांवर प्रभाव' हा यंदाचा प्रमुख विषय असून अहिंसा, समता, न्याय, करुणा व लोककल्याणकारी राज्यकारभार या मूल्यांचा अभ्यास करण्याची संधी सहभागींस मिळणार आहे. निवडक निबंधांचे महोत्सवात सादरीकरण : उत्कृष्ट निबंधांना पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात येणार असून निवडक निबंधांचे महोत्सवात सादरीकरण होणार आहे. नोंदणी व माहितीसाठी फुले आंबेडकर शिक्षक संघटना पॅक्टो जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे यांचेशी संपर्क साधावा. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. विजय आठवले, प्रा. सुनील कांबळे, अनिल गवई, विद्याधर मोहोड, प्रा. शैलेश इंगळे, प्रा. सज्जन जाधव, प्रा. विवेक पांडे, संदेश गवई, सुमेध घनबहादूर आदींनी केले आहे. महोत्सव ठरेल परिवर्तनाची नांदी : भारताच्या इतिहासातील महान सम्राट अशोक यांच्या समता, बंधुता, लोकशाही, लोककल्याण, अहिंसेच्या विचारांचा व धोरणांचा प्रसार करून समाजात नवी दिशा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित राज्यस्तरीय अशोक पर्व महोत्सव हा परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय आठवले यांनी व्यक्त केल आहे. सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी घराघरात अशोक' ही अभिनव संकल्पना राबवण्यात येणार असल्याचे पॅक्टोचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे यांचे म्हणणे आहे. असा होणार महोत्सव : महोत्सवात व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजजागृती रॅली तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून सम्राट अशोक यांच्या स्वर्णीम इतिहासाचा उजाळा देत समाजात सकारात्मक व परिवर्तनवादी विचारांची रुजवात करण्यावर भर दिला जाणार आहे. सामाजिक व धार्मिक प्रबोधनासाठी भवन सुंदर वानखेडे यांनी पाचशे धम्मग्रंथांचे दान जाहीर केले असून हे ग्रंथ उपासक-उपासिका संघटनांना वितरित करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे अशोक विचारांचा प्रसार अधिक व्यापक होणार आहे. अशोक पर्व महोत्सव’ अंतर्गत होणार निबंध स्पर्धा राज्यस्तरीय ‘अशोक पर्व महोत्सव’ अंतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार व सामाजिक परिवर्तनाच्या मूल्यांना चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्पर्धेत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्व वयोगटांतील नागरिकांना सहभागी होता येणार आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून प्रभाग क्रमांक १४ मलकापूर, शिवनी भागाला पाणीपुरवठा करणारा बुस्टर वीज पंप नादुरुस्त झाल्यामुळे या भागात पाणीपुरवठा न झाल्याने ऐन उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा, या मागणीचे निवेदन प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक पराग गवई, नगरसेविका उज्वला पातोडे, नगरसेविका जयश्री बहादुरकर, नगरसेवक शेख समशू शेख कमर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रवीण पातोडे, सौरभ बहादुरकर यांनी मनपा आयुक्त यांना शुक्रवारी दिले. तसेच पाणीपुरवठा विभाग प्रमुख अमोल डोईफोडे यांच्यासोबत बैठक घेतली व तत्काळ पाणी समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘बूस्टर वीजपंप काही दिवसांपूर्वी दुरुस्त करण्यात आला होता. परंतु ग्रामपंचायत अस्तित्वात असतानापासूचा १४ वर्षे जुना बुस्टर पंप असल्याने वारंवार तो जळून नादुरुस्त होत आहे. परिणामी मलकापूर, शिवणी परिसरासह वाढीव वस्तीतील नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी उन्हाळा आला की वाढत्या तापमानामुळे हा बुस्टर पंप नादुरुस्त होतो. या पंपाची कार्यक्षमता संपल्याने मलकापूर शिवनी करता नवीन बूस्टर पंप उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक पराग गवई यांनी केली आहे. मलकापूर, शिवनी भागात तसेच प्रभागातील अनेक भागांमध्ये पाण्याची जलवाहिनी नसून, तसेच अनेक भागांमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतची पाण्याची जुनी जलवाहिनी आहे. त्यामध्ये पाणी येत नाही. त्यामुळे त्या भागात पाण्याची कुठली व्यवस्था नाही. अकोला शहरातील उन्हाळा बघता नागरिकांना पाण्यासाठी कुठले त्रास होऊ नये. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये करता टँकरची व्यवस्था करण्यात यावी तसेच प्रभागातील बंद पडलेले हॅन्ड पंप दुरुस्त करून देण्यात यावे. तसेच खडकी ते मलकापूर या भागात नवीन मोठी पाण्याची जलवाहिनी टाकण्यात यावी.’ अशी मागणी देखील परिसरातील नागरिकांकडूनवारंवार करण्यात येत आहे.
बुवाबाजी विरोधी परिषद आज; भोंदूगिरीवर प्रहार:प्रा. मानवांचे बुवा तिथे बाया'' विषयावर व्याख्यान
नाशिकच्या भोंदू खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी अकोला शहरात शनिवारी, १८ एप्रिल रोजी मराठा मंडळ मंगल कार्यालय, रामदापेठ येथे बुवाबाजी विरोधी परिषदेचे आयोजन केले आहे. दुपारी १ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही परिषद चालणार असून समारोप प्रा.श्याम मानव यांच्या बुवा तिथे बाया' (खरात फाईल्स बळी स्त्रियांचा) या विषयावरील जाहीर सभेने होणार आहे. आयोजन अकोल्यातील सर्व सुजाण नागरिक व विविध सामाजिक संघटना मिळून आम्ही सारे अकोलेकर या नावाने केले आहे. परिषदेचे अध्यक्ष शेतकरी नेते प्रकाश पोहरे असतील तर उद्घाटन सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आ. नितीन देशमुख, आ. अमोल मिटकरी, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, डॉ. गजानन नारे, प्रा. संतोष हुसे, डॉ. दीपक मोरे, विजय कौसल, चंद्रकांत तराळ, डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्रा. मुकुंद भारसाकळे, डॉ. रणजीत कोरडे, डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. मिलिंद चौखंडे, डॉ. सीमा तायडे, डॉ. झिशान हुसैन, पराग गवई, प्रकाश दाते, राधाताई बिडकर, सौरभ वाघोडे, अॅड. रुपाली राऊत व अॅड. अनिल लव्हाळे उपस्थित असतील. बुवाबाजी विरोधी परिषद व जाहीर सभा निःशुल्क असून परिषदेत नोंदणी साठी 9881597237 क्रमांकावर नोंदणी करण्याचे आवाहन अयोजकांनी केले परिषदेत तीन सत्र राहणार आहेत. यात बुवाबाजी व महिलांची मानसिकता, भूतप्रेत, तंत्रमंत्र, देवी अंगात येणे जादूटोणा (चमत्कार प्रत्यक्षिकांसह), ज्योतिषशास्त्र नशीब खरे की खोटे? असे तीन सत्र होणार असून या सत्रांना अनुक्रमे डॉ. आशा मिरगे, शरद वानखडे, अशोक घाटे व पुरुषोत्तम आवारे मार्गदर्शन करणार आहेत. प्रश्नांची उत्तरे मिळणार परिषदेचा समारोप प्रा. श्याम मानव यांच्या जाहीर व्याख्यानाने होणार असून त्यात कॅप्टन खरात सारख्या ढोंगी बुवा-बाबांना महिला का बळी पडतात? ते महिलांना कोणती प्रलोभने देतात? महिलांचे कशाप्रकारे शारीरिक-आर्थिक शोषण करतात? अशा बुवाबाजीपासून आपले व कुटुंबातील महिलांचे कसे रक्षण करावे? या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देणार आहेत. तथा आजपर्यंत शेकडो बुवाबाबांचे केलेले भांडाफोड मांडणार आहेत.
जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सतत बदलत्या हवामानात शेतकरी, शेतमजूर, कामगार, मजूर, आशा सेविका यांचे उन्हापासून संरक्षण व त्यांची शारीरिक क्षमता मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे ‘इंटिग्रेटेड क्लायमेट रिस्क मॅनेजमेंट इन इंडिया' (इन क्रिस) हा प्रकल्प जिल्ह्यात राबवला जात आहे. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्वात असुरक्षित घटक, म्हणजेच शेतकरी आणि कृषी कामगारांचे उर्वरित. पान ४ ^शहरासह जिल्ह्यातील तापमानात सतत वाढ होत आहे. शुक्रवारी १७ रोजी कमाल तापमान ४४.४ तर किमान तापमान २३.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. २० एप्रिलपर्यंत सतत तापमान वाढणार असल्याने नागरिकांनी उन्हापासून स्वत:चे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यानंतर काही दिवस उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. - प्रा. अनिल बंड, हवामानतज्ज्ञ. सकाळी ११ नंतर सायंकाळी ५.३० पर्यंत काम करू नये ^जिल्ह्यात तापमान ४४ अंशावर पोहोचल्याने शेतकरी, शेतमजूर, कामगार, घरकामगार, मजूर, आशा सेविका, कटल्यावर साहित्याची वाहतूक करणाऱ्यांनी वाढत्या तापमानात स.११ वाजतानंतर तसेच सायंकाळी ५.३० वाजताच्या आधी काम करू नये. कारण, त्यांना उष्माघाताचा धोका होऊ शकतो. तसेच सतत घाम येत असल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊन डीहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. कारण, सध्या वाढते तापमान अपायकारक ठरू शकते. त्यामुळे धोका कोणीही पत्करू नये. - डॉ. वसंत लुंगे, राष्ट्रीय सहसचिव, आयएमए.
जिल्ह्यातील बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नगदी, रोखीचे व्यवहार रखडले आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीण, आदिवासी भागातील अर्थव्यवस्थेवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. कारण, शहरात बहुतांश लोक हे युपीआय, फोन पे, गुगल पे, ऑनलाईन पैशाचे व्यवहार करतात. परंतु, ग्रामीण भागात अजुनही रोख रकमेशिवाय भागत नाही. शेतमजूर, कामगारांना रोख रक्कमच द्यावी लागते. ती थकली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ५० लाखाची मागणी केल्यास फारतर २० ते २५ लाख रुपये रोख पाठवली जात असून त्यातच भागवावे लागत असल्याचे बँक व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. ही परिस्थिती निवळण्यास किमान एक आठवडा लागेल, असे बँक व्यवस्थापकांनी सांगितले. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मजुरी देण्यासह शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात अडथळे येत असून आर्थिक नियोजन कोलमडले आहे. तसेच व्यापाऱ्यांनाही रोख रकमेअभावी व्यवहार करणे कठीण जात आहे. जिल्ह्यात अमरावतीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे उर्वरित. पान ४ ^रोख रक्कम उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर चुकारा करणे कठीण होत आहे. त्यामुळे आमचे व्यवहार अडचणीत आले आहेत.बँकांनी बाजाराच्या दिवशी पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध करून द्यावी, मेळघाटातील बहुतांश गावामध्ये ऑनलाईन सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना नगदीच चुकारा लागतो. मात्र, बँकेत नगदी मिळत नसल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. - सतीश व्यास, संचालक, कृउबास अचलपूर सुटीचे दिवस, सण-उत्सव, पर्यटन तसेच लग्न सराई असल्याने सर्वांनाच रोख रकमेची आवश्यकता आहे. अशात एटीएममधील रोख लवकर संपत आहे. कारण, बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे मागितलेल्या रोख रकमेच्या तुलनेत त्यांच्याकडे निम्मी रोख रक्कम येत असल्याने त्यांनाही एटीएममध्ये सध्या विचारपूर्वक रोख रक्कम टाकावी लागत आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी अशी स्थिती असल्याने एटीएम रिकामे होत आहेत. नरेश हेडाऊ, शिखर बँक व्यवस्थापक एटीएममधील रोखही लवकर संपत आहे आमचे सध्याचे व्यवहार अडचणीत आलेत रोज २० लाखाची मागणी, पण रोखच नाही आम्ही दररोज २० लाखाची मागणी करतो. परंतु, जिल्ह्यात सर्वच बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा आहे. कारण बँकेत रोखच येत नाही. क्षेत्रिय कार्यालयालाकडून पुढच्या आठवड्यात रोख येईल असे सांगण्यात आले आहे. तोवर आम्हालाकाही करता येणार नाही. - मंगेश भुरे, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक, घाटलाडकी
तालुक्यात यावर्षी प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची लागवड करण्याचा ठाम निर्णय शेतकरी संघटनेने घेतला असून, या संदर्भात शुक्रवारी १७ रोजी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. शेतकरी संघटनेच्या मते, एचटीबीटी बियाणे तणनाशक सहनशील असल्यामुळे शेतीतील उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. सध्या मजुरांची टंचाई, वाढते फवारणी व खतांचे दर यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत एचटीबीटी बियाण्यांमुळे अतिरिक्त खर्चावर नियंत्रण मिळवता येईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा दावा संघटनेने केला आहे. सोबतच शासनाने या बियाण्यांवर बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकार परदेशातून एचटीबीटी संबंधित सोयाबीन, सोयाबीन तेल आणि पेंड आयात करत असताना देशातील शेतकऱ्यांना त्याच बियाण्यांची लागवड करण्यास बंदी घालणे हे दुटप्पी धोरण असल्याचा आरोपही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, शेतकरी संघटनेने जाहीरपणे एचटीबीटी बियाण्यांची लागवड करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, सरकारने शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव गावंडे, अंजनगाव तालुका अध्यक्ष संजय हाडोळे, स्वतंत्र भारत पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन दुधाट, जिल्हा समन्वयक मनोहर रेचे, सुनील साबळे, जिल्हा उपाध्यक्ष देविदास ढोक, अशोक गीते, मोहन ठाकरे, संजय हिंगे, बाबूराव साबळे, अरुण गोंडचोर, मधुकर मोरे, ज्ञानेश्वर वानखडे, प्रभाकर डोंबाळे, विनोद चिंचोळकर, विलास धुमाळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
शहरातील मोर्शी ते सिंभोरा रोडलगत असलेल्या बालाजी नगरातील खुल्या जागेवर नमो उद्यान साकारण्यात यावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. संतप्त नागरिकांच्या वतीने शेकडो सह्यांचे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनाची प्रतिलिपी आ. चंदू यावलकर यांना देण्यात आली. शहर विकासाच्या दृष्टीने नमो गार्डनचे एक मॉडेल तयार करण्यात आले आहे. हे मॉडेल भव्य-दिव्य परिसर असलेल्या बालाजी नगर येथील शिवपार्वती मंदिरासमोर, मोर्शी ते सिंभोरा रोडलगत असलेल्या जागेवर साकारण्यात यावे, असा मानस तेथील नागरिकांनी आ. यावलकर यांच्याकडे व्यक्त केला. आता निवडणुकीदरम्यान सत्ता स्थापन झाल्यानंतर नगरपरिषदेच्या वतीने हे नमो उद्यान बालाजी नगरऐवजी शहरातील मालवीय गार्डन येथे स्थानांतरित करण्याचा घाट घातला आहे. याला नागरिकांचा विरोध आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या मालवीय नगरातील उद्यानाची पूर्णपणे दुरुस्ती करण्यासाठी नगरपरिषदेने ठराव घेऊन १ कोटीच्या निधीचे इस्टिमेट तयार केले. बालाजी नगर येथे होणाऱ्या नमो उद्यानाचा निधी मालवीय गार्डन येथे तयार असलेल्या उद्यानावर खर्च केला जात असल्याची माहिती बालाजी नगर येथील नागरिकांना मिळाली. त्यांनी संबंधित नगरसेवकांकडे धाव घेऊन नमो उद्यानाची निर्मिती शिवपार्वती मंदिरासमोरील खुल्या जागेवरच व्हावी, अशी मागणी रेटून धरली. या प्रकल्पासाठी सुमारे ९९ लाख ९९ हजार ८९९ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र मालवीय गार्डन येथील उद्यानात जॉगिंग ट्रॅक, गार्डन, बेंचेस, वृक्षारोपण, लाईट व सोलर लाईट यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. तरीदेखील याच कामांसाठी पुन्हा खर्च दाखविण्यात आल्याने संतप्त नागरिकांनी आर्थिक अनियमिततेचा संशय व्यक्त केला आहे. बालाजी नगर येथील शिवपार्वती मंदिरासमोर असलेल्या ओपन प्लेसमध्येच नमो उद्यानाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका प्रीती देशमुख यांनी केली आहे. नमो उद्यान हे नवीन जागेवरच विकसित करण्यात यावे, असा शासनाचा जीआर आहे. त्या अनुषंगाने बालाजी नगर येथील शिवपार्वती मंदिरासमोर असलेला खुला परिसर निश्चित करण्यात आला होता, अशी माहिती आ. चंदू यावलकर यांनी दिली.
शहराचा चेहरामोहरा बदलण्यासोबतच नागरी सुविधांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता विकासात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी शुक्रवार १७ रोजी सकाळी ६.३० वाजता शहरातील विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. शहर स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. दस्तूर नगर येथील झोन क्रमांक ३ मधील कचरा संकलन केंद्राची पाहणी करून संपूर्ण केंद्र स्वच्छ, सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शहराचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी कचरा संकलन केंद्रे सुस्थितीत ठेवण्याला महानगरपालिकेचे प्राधान्य आहे. त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाळ्यापूर्वीची पूर्वतयारी म्हणून नाल्यांची नियमित साफसफाई करण्यावर महानगरपालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेस नगर परिसरातील नाल्यांच्या पाहणीदरम्यान नाल्यात हॉकर्स व काही नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. यावर कठोर भूमिका घेत नाल्यात कचरा टाकला जाणार नाही. नाल्याची नियमित साफसफाई केली जावी. असे निर्देश देण्यात आले. यावेळी नाल्यांमध्ये गाळ साचणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ऑक्सिजन पार्क परिसरात पाहणीवेळी रस्त्याच्या कडेला असलेले बांधकाम साहित्य हटवण्याबाबत नागरिकांना व व्यावसायिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले. विशेषत: ऑक्सिजन पार्कसारख्या सार्वजनिक ठिकाणी साहित्याची साठवणूक टाळावी. शहराच्या सौंदर्यीकरणात सर्वांनी हातभार लावावा. अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली. शहराचा विकास हा केवळ प्रशासकीय प्रयत्नांनी नव्हे. तो लोकसहभागातून अधिक प्रभावी होतो. असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. नागरिकांनी आपला घरगुती कचरा घंटागाडीतच द्यावा. सार्वजनिक स्वच्छता राखावी. महानगरपालिकेला सहकार्य करावे. असे आवाहन त्यांनी केले. अमरावतीला एक आदर्श शहर बनवण्यासाठी प्रशासन व नागरिक यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी सकारात्मक पाऊल ऐतिहासिक छत्रीतलाव परिसराला भेट देऊन त्याचा विकास करून त्याला पर्यटनस्थळाचे स्वरूप देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वडाळी उद्यानाला भेट देऊन त्याचे पूर्वीचे वैभव परत मिळवण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. असे आयुक्त म्हणाल्या. या प्रकल्पांना गती देऊन शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी प्रशासन सकारात्मक पावले उचलत आहे. तसेच उद्यानांची नियमित स्वच्छता व देखभाल करण्याबाबतही संबंधित यंत्रणेला मार्गदर्शन करण्यात आले.

30 C