राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या 59 वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी संसदीय कारकिर्दीचा टप्पा गाठल्यानंतर तिसऱ्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली असून, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी व्हीलचेअरवर बसूनच ही शपथ ग्रहण केली. विशेष म्हणजे शरद पवारांच्या या निवडीमुळे आता पवार कुटुंबातील तीन पिढ्या एकाच वेळी संसदेत कार्यरत असल्याचे ऐतिहासिक चित्र पाहायला मिळणार आहे. याचसोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील शपथ घेतली आहे. आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांचा व्हिडिओ ट्विट करत 'देशातील सर्वात तरुण लोकनेता' असे वर्णन केले आहे. महाराष्ट्रातून माया ईवाते (भाजप), रामराव वाडकुटे (भाजप), ज्योती वाघमारे (शिवसेना) यांनी देखील आज शपथ घेतली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आता अधिकृतपणे राज्यसभा सदस्य म्हणून संसदेत प्रवेश करणार असून, 10 एप्रिल रोजी त्यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पार्थ पवार यांची पहिल्यांदाच राज्यसभेवर वर्णी लागली असून, ते 9 एप्रिल रोजी आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतील. या दोन्ही नेत्यांच्या संसदेतील एन्ट्रीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व आता देशपातळीवर अधिक प्रबळ होताना दिसत आहे. शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र स्तरावरील चारही सभागृहांचे सदस्यपद भूषवण्याचा बहुमान मिळवला असून, त्यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाची सुरुवात 1967 मध्ये पहिल्या आमदारकीच्या विजयाने झाली. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या पवारांनी 1968 मध्ये पहिल्यांदा राज्याची धुरा सांभाळली, तर 1984 मध्ये बारामतीतून खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर 1985 मध्ये ते पुन्हा विधानसभेच्या रिंगणात परतले. राज्यासोबतच केंद्रातही महत्त्वाची मंत्रिपदे भूषवत त्यांनी भारतीय राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 1990 पर्यंत सलग सहा वेळा बारामतीचे आमदार राहिलेल्या शरद पवारांनी 1991 ते 2014 या काळात बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून नेतृत्व केले आणि 2014 पासून ते राज्यसभेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. गेल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात, 1998-99 मध्ये लोकसभा बरखास्त झाल्याचा अल्प काळ वगळता, ते सातत्याने राज्याच्या किंवा देशाच्या कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सक्रिय सदस्य राहिले असून, आता पुन्हा एकदा राज्यसभेची शपथ घेतल्याने त्यांचा हा ऐतिहासिक संसदीय कार्यकाळ 2032 पर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे.
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचाली वेगाने सुरू झाल्या असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी महायुतीची भूमिका होती. मात्र, काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक लढवावी लागत आहे. या घडामोडींमुळे बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली होती. त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळली. विशेषतः अर्थ खात्याचे काम त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने हाताळले. ‘लाडकी बहीण’ योजनेचा निर्णय घेताना देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे शिंदे यांनी नमूद केले. एक सक्षम प्रशासक आणि संघटक म्हणून अजित पवारांची ओळख होती, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कामाचाही उल्लेख केला. अजित पवारांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी त्यांनी सक्षमपणे भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील कारभार पुढे नेण्यासाठी त्या आणि महायुतीतील नेते एकत्रितपणे काम करत आहेत, असे शिंदे म्हणाले. बारामतीतील विकासकामांची त्यांना चांगली जाण असून, स्थानिक जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. पुढे बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, अनेक सामाजिक संघटनांनी देखील सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा होती. परंतु, आता निवडणूक झाल्यास त्याचा निकाल जनतेच्या मतांमधून स्पष्ट दिसेल, असे ते म्हणाले. विरोधकांनी परंपरा लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा शेवटी शिंदे यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा देताना म्हटले की, जर बारामतीत निवडणूक झालीच, तर अजित पवारांनी केलेल्या कामाची पोचपावती मतदार देतील. आणि त्या मतांमधून सुनेत्रा पवार यांचा विजय मोठ्या फरकाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे बारामती पोटनिवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत थेट लढत रंगणार आहे. दरम्यान, आकाश मोरे यांनी अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यास आपण निवडणुकीतून माघार घेऊ, असे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या वडिलांनी, माजी आमदार विजयराव मोरे यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत राजकीय वातावरण तापवले आहे. विजयराव मोरे यांनी शरद पवार यांच्यावर थेट टीका केली. शरद पवार आता केवळ कुटुंबापुरता विचार करत आहेत. वयोमानानुसार त्यांच्या राजकारणात बदल झाला आहे, असा आरोप त्यांनी केला. मी शरद पवारांपेक्षा दोन महिन्यांनी मोठा आहे आणि त्यांच्या राजकारणाची मला पूर्ण जाण आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी असेही नमूद केले की, जर शरद पवार यांनी या निवडणुकीत उमेदवार दिला असता, तर त्यांनी त्यांचा प्रचार केला असता. पुढे बोलताना विजयराव मोरे यांनी काही वादग्रस्त मुद्दे उपस्थित केले. त्यांनी गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या मैत्रीचा उल्लेख करत काही संस्थांना मदत झाल्याचे सांगितले. तसेच 2024 च्या निवडणुकांमध्ये त्यांनी शरद पवार गटासाठी प्रचार केला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सुप्रिया सुळे या भाजपच्या जवळ गेल्याचे चित्र दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. इतिहास सांगताना विजयराव मोरे म्हणाले की, त्यांच्या राजकारणाची सुरुवात समाजवादी पक्षातून झाली. 1967 मध्ये त्यांनी शरद पवारांच्या विरोधात प्रचार केला होता, तर 1972 मध्ये त्यांच्याविरोधात निवडणूकही लढवली. नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर 1990 साली विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्यात शरद पवारांचा मोठा वाटा होता, असे त्यांनी मान्य केले. तरीही 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर त्यांनी त्यात प्रवेश केला नाही. आजही त्यांचे शरद पवारांशी वैयक्तिक संबंध चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. 23 एप्रिल रोजी मतदान, 4 मे रोजी निकाल दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या निधनामुळे होत आहे. या निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे यांच्यातील लढत अधिकच लक्षवेधी ठरत आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज अजित पवारांच्या आठवणीने चांगल्याच भावूक झाल्या. बारामती ही अजित पवारांची श्वास होती. त्यामुळे त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला. त्यांचा येथील प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळा, इमारतींना स्पर्श झाला. त्यामुळे आज या सर्व गोष्टी त्यांच्या आठवणीने रडत आहेत. पण मी स्वतः माझे दुःख तळघरात कोंडले आणि अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले, असे त्या आपले आतापर्यंत दाबून ठेवलेले अश्रू मोकळे करताना म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांनी आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला. तत्पूर्वी, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आपल्या भावना व्यक्त केल्या. सुनेत्रा पवार म्हणाल्या, अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी आपण सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला आदरणीय दादांना गमावले. आज त्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. मी आज अर्ज दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटले नव्हते की, बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा आपल्यात नाहीत असे मला अजूनही वाटत नाही. मला ते मान्यही नाही. पण नियतीने हा काळ माझ्यावर व तुमच्यावर आणला आहे. दादांचे जाणे ही केवळ माझी व माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हाणी नाही, तर बारामती, महाराष्ट्र व देशाचीही हाणी झाली आहे. आज प्रत्येक पान-फुल दादांच्या आठवणीने रडतंय दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती. बारामतीचा प्रत्येक कार्यकर्ताच नव्हे तर प्रत्येक नागरीक दादांसाठी खरा पांडुरंग होता. बारामतीची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा हाच त्यंचा विश्वास व आधार होता. बारामती म्हणजे दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला. बारामतीच्या प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळेत, नदी, इमारतीत दादांचा स्पर्श आहे. त्या निर्जिव इमारती, ती न बोलणारी पाणे आणि फुले सुद्धा आज दादांच्या आठवणीने रडत आहेत, असे सुनेत्रा पवार रडत म्हणाल्या. मी माझे दुःख सुद्धा तळघरात कोंडले सुनेत्रा पवार म्हणाल्या, बारामतीकरांच्या विकासासाठी आदरणीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझे दुःख सुद्धा तळघरात कोंडले. अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारामतीकरांकडे पाहूनच आला आहे. तुमचे प्रेम, तुमचा पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे, हे मी नम्रपणे कबूल करते. गेल्या 35-36 वर्षांत तुम्ही सर्वांनी अजित पवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिले. दादांच्या तळमळीने प्रत्येक बारामतीकर आपणच उमेदवार आहोत या भावनेने दादांची निवडणूक नेहमीच हातात घेत होते. त्यामुळेच दादांनी प्रत्येक वेळी आपल्या स्वतःच्याच मताधिक्याचे विक्रम मोडित काढले. ही दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या, तुमच्या मताचा बोजा माझ्यावर आहे म्हणून मी 24 तास काम करतो असे ते म्हणायचे. त्यांच्या माघारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही केवळ निवडणूक नाही, तर दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रत्येक बारामतीकराला मिळालेली संधी आहे. शरद पवार साहेबांनी या बारामतीला विकासाचा दृष्टिकोन दिला. त्यावर दादांनी आपल्या कष्टाने रंग भरले, कोंदण भरले, या बारामतीला फुलवले, जगवले आणि जागतिक दर्जाकडे नेले. आपल्या बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होणार नाही याचे मी वचन देते. बारामती जगातील सर्वात विकसित व प्रगत तालुका बनवणे हे दादांचे स्वप्न नव्हते, तर त्यांची जिद्द होती. एक ध्यास होता. दादांना बारामती एक जागतिक दर्जाचे शहर बनवायचे होते. हे स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच नियतीने त्यांना आपल्यातून नेले. ते केवळ एक व्यक्ती नव्हते, तर तो एक विचार होता. एक व्यवस्था होते. लोककल्याणकारी, लोककल्याणाची एक तळमळ होते. जोपर्यंत जिवातजीव आहे, तोपर्यंत बारामतीकरांची सेवा करतच राहील, हे शब्द त्यांनी खरे केले आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, हे त्रिवार सत्य सर्वांना ठावूक आहे. त्यांच्या विकासाच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार मी केला आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजितदादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही सुनेत्रा पवार अजित पवारांची आठवण काढताना पुढे म्हणाल्या, अजितदादा शब्दाला जागणारे होते. त्यांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. त्यांना साक्षी ठेवूनच मी तुम्हाला हे ही वचन देते की, माझ्यासाठी पार्थ व जय हेच माझे कुटुंब नाही. संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे. प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. या कुटुंबाच्या विकासासाठी मी आयुष्यभर झटत राहील. दादांच्या अचानक जाण्याने अनेक कार्यकर्त्यांचे मनोबल खचले. पण काळजी करू नका. एकाही कार्यकर्त्याला मी वाऱ्यावर सोडणार नाही. दादांचा जनता दरबार यापुढेही तसाच सुरू राहील. लोकांची कामे होणे ही दादांना श्रद्धांजली आहे. त्यांच्या जाण्याने बारामतीत अत्यंत अस्वस्थतेचे वातावरण होते. आजही तशाच भावना आहे. व्यापारी, शेतकरी, उद्योजक, तरुण, महिला आदी सर्वजण हवालदिल झाले होते. पण आज मी ठामपणे सांगते की, बारामतीचा विकास हा पूर्वीसारखाच वेगाने सुरू राहील, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; जहीर शेखवर गुन्हा दाखल
भिगवण : भिगवण अपहरण प्रकरणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला आहे. आपण मुलासोबत स्वत:च्या मर्जीने गेल्याने तरुणीने सांगितले होते. मात्र, आता जहीर शेखने आपले अपहरण केल्याची तक्रार केली आहे. तिने आपल्यावर लैगिंक अत्याचार करुन कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तिच्या तक्रारीनसुार जहीर शेखसह चौघांविरोधात अपहरण आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला […] The post भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; जहीर शेखवर गुन्हा दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘रवींद्र एरंडे’च्या अडचणीत वाढ; ८ पीडित महिलांची ओळख पटली
नाशिक : प्रतिनिधी एकीकडे नाशिकमधील वासनांध भोंदू अशोक खरात याच्या महिला लैगिंक शोषण प्रकरणाने देशात खळबळ उडालेली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच त्याची पुनरावृत्ती शहरातील सातपूर येथे उघडकीस आली आहे. तथाकथित पत्रकार असलेल्या रवींद्र एरंडेच्या टॅब व हार्डडिस्कमधून महिलांच्या लैंगिक अत्याचाराचे तब्बल १२१ व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. रवींद्र एरंडे याच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत 4 […] The post ‘रवींद्र एरंडे’च्या अडचणीत वाढ; ८ पीडित महिलांची ओळख पटली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नांदेडमध्ये ४८ तासांत पाचवी हत्या
नांदेड : प्रतिनिधी नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांत गुंडराज पाहायला मिळत आहे. गेल्या ४८ तासांत पाचवी हत्या करण्यात आली आहे. नांदेड शहरातील श्रीनगर भागात दिवसाढवळ्या तरुणाला रस्त्यात गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. धक्कादायक म्हणजे हा तरुण शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचे उघडकीस आले आहे. या हत्येने नांदेडमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ही […] The post नांदेडमध्ये ४८ तासांत पाचवी हत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तसेच महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना काही अंशी यश देखील आले आहे. बारामतीनंतर आता राहुरी विधानसभेची पोटनिवडणूकही बिनविरोध करण्यासाठी भाजपने शेवटच्या क्षणी कंबर कसली आहे. भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर महायुतीतर्फे त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र, आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची अचानक भेट घेतल्याने, राहुरीची ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांशी प्राजक्त तनपुरेंची फोनवरून चर्चा राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी अचानक प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या तिन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बंद दाराआड चर्चेदरम्यान रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राजक्त तनपुरे यांचे फोनवरून बोलणे करून दिल्याचे समजते. या नाट्यमय घडामोडींमुळे तनपुरे आता निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्राजक्त तनपुरेंची प्रतिक्रिया या चर्चेच्या नंतर प्राजक्त तनपुरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांनी मला विनंती केली आहे. विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. याबाबत मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल. माझा उमेदवारी अर्ज भरुन तयार आहे. ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवायचे म्हणतोय, तो मुद्दाच सोडवण्याची तयारी त्यांनी दाखवली असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन मला निर्णय घ्यावा लागेल, असे तनपुरे यांनी म्हटले आहे. प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया पाहता ते या निवडणुकीतून माघार घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली- रवींद्र चव्हाण प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यानंतर त्याच्या घरातील कोणी निवडणुकीला सामोरे जात असेल, तर ती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. प्राजक्त तनपुरे, देवेंद्र फडणवीस, मी आम्ही सगळ्यांनी विधानसभेत एकत्र काम केले आहे. ते गेल्यावेळी राज्यात मंत्री म्हणून कार्यरत होते. राहुरी मतदारसंघातील विकासाचे विषय आणि समस्या एकत्रितपणे सोडवता येऊ शकतात. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली. ते आता त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेतील, अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे. ते जे म्हणतील त्या सगळ्या विकास कामाचा विचार केला जाईल पुढे बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, राहुरी मतदारसंघात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे, एमआयडीसी निर्माण होणे गरजेचे आहे. येथील धरणातील गाळ काढण्याची गरज आहे. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघातील समस्या कळकळीने मांडल्या. आम्ही यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे फोनवरुन बोलणे करुन दिले. आम्ही सर्वजण प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत आहोत. ते जे म्हणतील त्या सगळ्या विकास कामाचा विचार केला जाईल. प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या या भागातील वलयाची आम्हाला कल्पना आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आम्ही उमेदवारी मागे घ्यायची की नाही, हा निर्णय त्यांच्यावर सोडला असल्याचे चव्हाण म्हणाले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी काळात भाजप पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पुण्यात भाजपचे संघटन ५१ टक्क्यांच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष संघटनेच्या बळकटीवर भर देत, राज्यभरातही संघटना वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पक्षाचा विस्तार करण्यासाठी युवकांना मोठ्या प्रमाणावर जोडण्याचा संकल्पही त्यांनी मांडला. बावनकुळे हे भाजपा पक्ष स्थापना दिनानिमित्त पुणे शहरातील भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मंत्री माधुरी मिसाळ, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना बावनकुळे यांनी महत्त्वाचे विधान केले. ते लवकरच बारामतीला जाणार असून, सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज स्वतः भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा भाजप जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारामतीत ७५ टक्क्यांहून अधिक मतांनी विजय मिळवण्याचा दावाही त्यांनी केला. बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षाला बारामतीमध्ये निवडणूक न लढवण्याचे आवाहन केले. अजित पवार यांचा दीर्घ राजकीय प्रवास काँग्रेससोबत राहिला आहे, त्यामुळे त्यांच्या राजकीय योगदानाचा विचार करून काँग्रेसने सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. अशोक खरात प्रकरणावर बोलताना, हा विषय संवेदनशील असून विशेष तपास पथकाच्या (SIT) अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने बिनविरोध निवडणूक करणे हे भाजपच्या सोयीचे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने या प्रकरणी भाजपवर शरसंधान साधताना खासदार वसंतराव चव्हाणांच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? मंगळवेढ्याला भारत भालकेंच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. भाजप बिनविरोध निवडणूक करण्याच्या मुद्यावर केवळ आपल्या सोयीने राजकारण करतो, असे काँग्रेसने म्हटले आहे. राज्यात बारामती व राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी येत्या 23 तारखेला पोटनिवडणूक होणार आहे. या दोन्ही जागा अजित पवार व शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झाल्या आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पत्नी तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार स्वतः मैदानात आहेत. त्यामुळे त्यांना बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन केले जात आहे. काँग्रेस वगळता सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबाही दिला आहे. पण काँग्रेसने या ठिकाणी आपला उमेदवार दिल्यामुळे येथे निवडणूक होणार हे स्पष्ट आहे. भाजपने नेहमी आपल्याच सोयीचे राजकारण केले या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपवर आपल्या सोयीने राजकारण करण्याचा आरोप केला आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे या प्रकरणी म्हणाले की, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा फॉर्म आज अॅडव्होकेट आकाश मोरे काँग्रेसच्या वतीने भरणार आहेत, पण त्या संदर्भात बरीच खलबतं सुरू आहेत, टीकाटिप्पणी सुरू आहेत की काँग्रेसने ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी अशी परंपरा राहिलेली आहे. मग नांदेडच्या वसंतराव चव्हाणांच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? मंगळवेढ्याला भालकेंच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? अशी अनेक उदाहरणं जी आहे ती देता येईल, भाजपने सोयीने आपलं राजकारण केलेलं आहे. दुर्दैवानं ज्या पद्धतीनं अजितदादांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर घरच्या लोकांना वाटतं की त्याची एन्क्वायरी झाली पाहिजे म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सीबीआयची एन्क्वायरी मागितली. रिमाइंडर दिलं काय झालं त्याचं? रोहित पवार पिलर टू पोस्ट एफआयआर करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करत होते शेवटी कर्नाटक मध्ये त्यांचा प्रयत्न सफल झाला. ही तुमची संवेदनशीलता आहे का? आजही आमच्या उमेदवाराचं आणि काँग्रेस पक्षाचं हे म्हणणं आहे की तुम्ही एफआयआर दाखल करा महाराष्ट्रामध्ये, बारामतीमध्ये.मग त्याचा विचार करता येईल, मग लक्षात येईल की खरी तुमची भूमिका काय आहे, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे. काँग्रेसने संजय राऊतांनाही दाखवला आरसा दुसरीकडे, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन सावंत यांनीही या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, पत्रकार आणि राजकीय प्रवक्ते अशा दोन्ही भूमिका वठविताना सन्माननीय संजय राऊत यांची अनेकदा गल्लत होत असते. इतरांचे दोष दाखविण्याचा पत्रकार धर्म आणि राजकीय प्रवक्ते म्हणून दुसऱ्या पक्षांकडे बोट दाखविण्याची सवय यातून चार बोटे आपल्याकडे वळलेली आहेत याचा त्यांना सतत विसर पडतो. दुर्दैवाने आपण जे बोलतो तेच योग्य असा त्यांचा गैरसमज झाला आहे. आघाडी धर्मात इतर पक्षांचे मत असू शकते आणि त्यांच्याशी आधी चर्चा करणे गरजेचे आहे याची आवश्यकता वाटत नाही. एकतर्फी निर्णय जाहीर करायचे आणि नंतर काँग्रेसच्या नेत्यांना शोधायचे हे आघाडी धर्मात योग्य आहे का? असो! असे झाले नसते तर महाविकास आघाडीची मुंबई व चंद्रपूर महानगरपालिकेत आज सत्ता असती. आम्ही भाजपा विरोधात प्रामाणिकपणे लढत असल्याने आम्हाला त्यांच्याकडे वळलेली चार बोटे दाखविण्यात स्वारस्य नाही, असे ते म्हणालेत. हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती, असेही सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
अशोक खरातचे कॉल डिटेल्स (CDR) सार्वजनिक केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील दमानिया यांच्यावर टीका केली होती. आज पत्रकार परिषद घेत दमानिया यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अंजली दमानिया म्हणाल्या, खरातच्या सोबत जेवढ्या लोकांचे फोटो आहेत, त्या सगळ्यांचे नंबर मी शोधले. इतकेच नाही तर मला माहीत होते की सगळ्यांचे माझ्यावर आरोप होतील. म्हणून सुरुवातीपासून कोणाकोणाचे शोध घेतले त्याचा सीडीआरचे जे रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा मी देणार आहे. नॉनसेन्स! म्हणत सुषमा अंधारेंवर निशाणा पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांचा एकही कॉल नाही, उदय सामंत एकही कॉल नाही, भागवत कराड, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे एकही कॉल नाही. अब्दुल सत्तार एकही कॉल नाही, रामदास कदम नाही, योगेश कदम नाही, राधाकृष्ण विखे पाटील नाही, संजय राऊत नाही, राम कदम नाही, बच्चू कडू नाही, मोहित कंबोज नाही, गिरीश महाजन नाही. ज्यांचे नंबर मिळाले नाहीत त्यांना क्रॉस केले. आणि ज्यांचे मिळाले ते समोर आणले लगेच आरोप केले की यात भाजपचा एकही नाही. जो उठेल तो बोलतो. नॉनसेन्स! आम्ही लढतो विषयांवर, फालतूचे राजकारण करत नाही आम्ही, असे म्हणत दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केला. खड्ड्यात गेले तुमचे विचार अंजली दमानिया म्हणाल्या, मी बोलते तर मी सिलेक्टीव्ह. तर मग मिलिंद नार्वेकरांचा नंबर आला, 8 कॉल आले. केली तुम्ही चौकशी? मागणी केली त्यांच्या चौकशीची? काय बोलता अंधारे बाई तुम्ही? असे म्हणत दमानिया यांनी सुषमा अंदगरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तुमचा विषय काय? लढायचे आहे कोणाच्या विरोधात? खरातच्या विरोधात. मी फक्त माझ्याकडे आलेली माहिती दिली. तर लगेच वर खाली व्हायला लागल्या. दमानिया बाई अमुक, दमानिया बाई तमुक. त्यांनी हे नाही केले, ते नाही केले. खड्ड्यात गेले तुमचे विचार, तुमच्या खिशात ठेवा, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सगळे राजकारणी अशा भोंदू लोकांना प्रोटेक्ट करतात पुढे बोलताना अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणी महत्त्वाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, रुपाली चाकणकर यांचे एवढे फोन कॉल्स समोर आले आहेत. सुनील तटकरे यांचे सुद्धा अनेक कॉल्स समोर आले आहेत. अंधारे बाई ऐका जी समरी येते, त्यात इनकमिंग कॉल्स किती, किती वेळ बोलणे झाले ते सगळे येते. शिवसेनेचे शिंदे यांचे 17 कॉल आले आहेत. संजय शिरसाट यांचे कॉल्स मिळाले. त्यानंतर काल मुंबईकडे येताना प्रभाकर काळे जे एकनाथ शिंदे यांचे पीए आहेत, त्यांच्याकडून एका नंबरवरून 11 कॉल आणि दुसऱ्या नंबरवरून एक कॉल असे करण्यात आले आहेत. माझा राग या गोष्टीवर आहे की या सगळे राजकारणी अशा भोंदू लोकांना प्रोटेक्ट करतात. त्यांना विचारले पाहिजे की तुम्ही एवढे कॉल त्याला का केले? अशी मागणी दमानिया यांनी केली. अशोक खरात प्रकरणी धक्कादायक माहिती उघड आता अतिशय गंभीर विषय आहे. समता नावाची पतसंथा आहे. त्यात पैसे टाकले किंवा काढले की एसएमएस येतो. माझ्याकडे सीडीआर कुठून आला ते शोधू दे त्यांना. समता नावाची पतसंस्था ज्याची आता चौकशी सुरू आहे. त्याचे पूर्ण वेळात 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 कधी एक मेसेज यायचा, कधी 7 मेसेज यायचे महिन्याचे. असे मी पूर्ण काढले. पण आता महत्त्वाची बातमी ऐका. 27 जानेवारी म्हणजे अजित पवारांच्या निधनाच्या एक दिवस आधी, 17 मेसेज होते समताचे. 28 जानेवारी म्हणजे ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशीचे 19 मेसेज आहेत. 29 जानेवारी - 10 मेसेज. 30 जानेवारी 8 मेसेज, 31 जानेवारी - 8 मेसेज. हे दिवसाचे आहेत. म्हणजे यात काय झाले, हे एसआयटीकडे नेऊन तपासची मागणी करणार आहे.
आखातातील युद्धामुळे सध्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ग्रामीण भागात तर अनेकदा गॅसचा तुटवडा निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न उभा ठाकला असतानाच, भंडारा जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने आपल्या कल्पक बुद्धीने सर्वांना चकित केले आहे. जितेंद्र हरिदास आठोळे (३५, रा. पाहुनगाव, ता. लाखांदूर) या युवकाने घरच्या घरी 'बायोगॅस'चा असा काही यशस्वी प्रयोग केला आहे की, आता त्याला गॅस एजन्सीच्या फेऱ्या मारण्याची गरज उरलेली नाही. जितेंद्र आठोळे यांनी हा प्रयोग अत्यंत साध्या आणि कमी खर्चात पूर्ण केला आहे. त्याने यासाठी बाजारातून कोणतेही महागडे यंत्र आणले नाही. आपल्याकडील ५०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीत त्याने शेण आणि पाण्याचे मिश्रण (गोबर) टाकले. या मिश्रणातून नैसर्गिकरीत्या गॅस तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, हा गॅस साठवून ठेवण्याचे आव्हान जितेंद्रसमोर होते. त्यावर त्याने एक देशी जुगाड शोधून काढला. त्याने या टाकीला एक पाईप जोडून तो थेट ट्रॅक्टरच्या ट्युबला जोडला. टाकीत तयार होणारा गॅस या ट्युबमध्ये साठवला जातो. जेव्हा स्वयंपाक करायचा असतो, तेव्हा या ट्युबचा दुसरा पाईप शेगडीला जोडला की, निळ्या रंगाची ज्योत पेटते. महागाईच्या काळात 'आठोळे पॅटर्न'ची चर्चा सध्या सर्वत्र गॅसचा तुटवडा असल्याने अनेक कुटुंबांना नाइलाजास्तव पुन्हा जंगलात लाकूड फाटा गोळा करायला जावे लागत आहे. धुरामुळे महिलांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. अशा काळात जितेंद्रने शोधलेला हा मार्ग अत्यंत पर्यावरणपूरक आणि खिशाला परवडणारा ठरला आहे. या प्रयोगामुळे त्याच्या कुटुंबाची गॅसच्या समस्येतून कायमची सुटका झाली असून, ते आता याच बायोगॅसवर रोजचा स्वयंपाक करीत आहेत. ग्रामीण युवकांसाठी प्रेरणादायी पाऊल जितेंद्र आठोळे यांच्या या प्रयोगाची माहिती मिळताच पाहुनगाव आणि परिसरातील नागरिक त्यांचा हा 'बायोगॅस प्रकल्प' पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. गरज ही शोधाची जननी आहे, ही म्हण जितेंद्रने सार्थ ठरविली आहे. केवळ ३५ वर्षांच्या या तरुणाने दाखवून दिले आहे की, जर इच्छाशक्ती असेल तर आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता आपल्याकडील उपलब्ध साधनसामग्रीतूनही आपण मोठी क्रांती घडवू शकतो. गॅसचे दर सतत वाढत आहेत आणि वेळेवर सिलिंडरही मिळत नाही. त्यामुळे मी घरच्या घरी हा प्रयोग करण्याचे ठरवले. ५०० लिटरची टाकी आणि जुनी ट्युब वापरून आज माझ्या घरचा स्वयंपाक सुलभ झाला आहे. इतर शेतकऱ्यांनीही असा प्रयोग केल्यास इंधनाचा खर्च वाचू शकतो, अशी भावना जितेंद्र हरिदास आठोळे यांनी या प्रकरणी व्यक्त केली आहे.
नाशिकमधील सातपूर परिसरातील अश्लील व्हिडिओ आणि लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, मुख्य संशयित तथाकथित पत्रकार रवींद्र एरंडे याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या चार मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या तपासादरम्यान आतापर्यंत 8 पीडित महिलांची ओळख पटवण्यात यश आले असून, जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपीवर आणखी गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणाचा उलगडा अत्यंत नाट्यमयरीत्या झाला असून, सुरुवातीला स्वतःला पीडित भासवणाऱ्या रवींद्र एरंडेनेच चार जणांविरुद्ध 12 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार सातपूर पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी या तक्रारीवरून चौघांना अटक केली खरी, मात्र तपासादरम्यान एरंडेच्या स्वतःच्या टॅबमध्ये तब्बल 87 अश्लील व्हिडिओ आढळून आल्याने तपासाला वेगळेच वळण मिळाले. खंडणीचा बनाव रचणाऱ्या तक्रारदाराचाच खरा आणि विकृत चेहरा समोर आल्याने पोलिसांनी अखेर त्यालाच बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तोच असल्याचे स्पष्ट झाले आहे. एरंडेकडून 4 मोबाइल, 2 पेनड्राइव आणि 1 मेमरी कार्ड जप्त पोलिसांनी एरंडेकडून 4 मोबाइल, 2 पेनड्राइव आणि 1 मेमरी कार्ड जप्त केले आहे. तसेच त्याचे ऑफिसवर छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. या मोबाइलमधील डिलीट केलेला डेटा सायबर तज्ञांकडून रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. आरोपी एरंडेने गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केले होते. तपासात आतापर्यंत 8 पीडित महिलांची ओळख पटवण्यात आली आहे. यात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि कंपनीत काम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. एरंडेकडून मिळवलेले हे अश्लील व्हिडिओ फक्त ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले जात होते की त्यांची ब्लू फिल्म म्हणून विक्री केली जात होती, या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. विशेष म्हणजे नाशिक आणि इगतपुरीच्या विविध हॉटेलमध्ये हे चित्रीकरण करण्याचा दाट संशय व्यक्त करण्यात आला आहे. रवींद्र एरंडेला आज न्यायालयात हजर करणार अश्लील व्हिडिओ आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित रवींद्र एरंडेची पोलिस कोठडी आज संपत असल्याने त्याला दुपारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून आणखी किती महिलांची फसवणूक झाली आहे आणि या रॅकेटमध्ये त्याचे इतर कोणी साथीदार सहभागी आहेत का, याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिस न्यायालयाकडे त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्याची दाट शक्यता आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या टप्प्यात अचानक घडलेल्या बदलांमुळे चर्चांना उधाण आले आहे. सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना केलेल्या फोन कॉलनंतर राजकीय समीकरणं बदलली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांचा बारामती दौरा अचानक रद्द झाल्याने या चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे. काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच बारामती पोटनिवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती. रविवारी पक्षाकडून आकाश मोरे यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. त्यामुळे सोमवारी उमेदवारी अर्ज भरताना हर्षवर्धन सपकाळ स्वतः उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अर्ज भरण्याच्या दिवशीच त्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली. अधिकृत कारण म्हणून केरळमधील निवडणूक प्रचाराचे कारण सांगितले जात असले तरी, या निर्णयामागे सुनेत्रा पवार यांच्या फोन कॉलचा प्रभाव आहे का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान, आकाश मोरे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यांच्या सोबत स्थानिक पातळीवरील काँग्रेस नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. सपकाळ यांच्या अनुपस्थितीत हा अर्ज भरण्याचा कार्यक्रम पार पडणार असल्याने काँग्रेसच्या भूमिकेबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. बारामतीत काँग्रेस खरोखर पूर्ण ताकदीने लढणार की काही बदल घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची माघार दुसरीकडे, या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवारीची घोषणा करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे. ते सोमवारी बारामतीत दाखल झाले असले तरी, त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे आणि धनंजय मुंडे यांनी हाके यांची भेट घेऊन सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ माघार घेण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. एकंदर पाहता, बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शेवटच्या क्षणी मोठे राजकीय बदल घडताना दिसत आहेत. एका फोन कॉलपासून सुरू झालेल्या चर्चांनी आता काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पुढील काही तासांत उमेदवारी अर्जांच्या प्रक्रियेनंतर परिस्थिती अधिक स्पष्ट होणार असली तरी, सध्याच्या घडामोडींमुळे बारामतीतील लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सुनेत्रा पवार या आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्याआधीचा त्यांचा दिवस भावनिक घडामोडींनी भरलेला पाहायला मिळाला. दुपारी साडेबारा वाजता त्या अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, अर्ज दाखल करण्याआधीच काही क्षण असे घडले की, सुनेत्रा पवार भावूक झाल्याचे दिसून आले. सकाळी साडेनऊच्या सुमारास सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या विद्या प्रतिष्ठान येथील स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले. या वेळी त्या अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. स्मृतीस्थळाकडे जाताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू दिसून आले. अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक असल्यामुळे या क्षणाला विशेष भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यानंतर सुनेत्रा पवार काटेवाडी येथून कन्हेरी हनुमान मंदिराकडे निघाल्या. या प्रवासादरम्यान त्यांनी अचानक ताफा थांबवून गाडीतून उतरून समर्थकांची भेट घेतली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. या वेळी कार्यकर्त्यांच्या भावना आणि उत्साह पाहून सुनेत्रा पवार यांचे डोळे पुन्हा पाणावले. काही वेळ त्या समर्थकांशी संवाद साधत होत्या आणि त्यांचे आभारही मानले. दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या निधनामुळे होत आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांची उमेदवारी विशेष महत्त्वाची मानली जात आहे. या निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. बारामती पोटनिवडणुकीची लढत रंगणार एकंदर पाहता, अर्ज दाखल करण्याआधीच सुनेत्रा पवार यांच्या दिवसात भावनिक क्षणांनी भर पडली. स्मृतीस्थळावरील अभिवादन असो किंवा समर्थकांशी झालेली भेट, प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या भावना स्पष्टपणे दिसून आल्या. आता या भावनिक वातावरणात बारामती पोटनिवडणुकीची लढत रंगणार असून, या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
'मी तुमच्या आवडीची साडी साडी घालून नवरी बनून तयार आहे. उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्यसंस्काराला या, अशा काळजाला हात घालणाऱ्या शब्दांत एका सासुरवाशिणीने आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना नागपुरात घडली आहे. पतीकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने नैराश्य आलेल्या या विवाहितीने आत्महत्या केली. या प्रकरणी तिच्या नवऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महादुला परिसरात ही घटना घडली. मयुरी मेंढे असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचे संदीप मेंढे नामक तरुणाशी लग्न झाले होते. पण पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्यामुळे गत काही दिवसांपासून ती आपल्या माहेरी महादुला परतली होती. ती मोठ्या मानसिक तणावात होती. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या पतीशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण पतीने फोन उचलला नाही. अखेर ती हताश झाली आणि त्याच नैराश्यातून तिने टोकाचे पाऊल उचलले. घरातील सदस्य काही कामानिमित्त बाहेर गेले असता तिने संधी साधून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी आढळली सुसाईड नोट रात्री कुटुंबीय घरी परतले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा त्यांना मयुरी गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आली. तिला तत्काळ लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत तिने आपल्या पतीवर प्रेम व्यक्त करत आपल्या मनातील दुःख व मानसिक त्रास कथन केला आहे. पोलिसांनी ती चिठ्ठी जप्त् केली आहे. मयुरीने काय म्हटले आहे आपल्या शेवटच्या चिठ्ठीत? मयुरी मेंढे आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हणते, मी तुमच्यावर खूप प्रेम करते संदीप. पण तुम्ही मला समजून घेत नाही. दीड महिन्यापासून मी तुम्हाला रोज समजावत होते. मला रोज एक आशा होती की, तुम्ही मला समजून घ्याल. पण तुम्ही समजायला तयारच नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. आता मी तुम्हाला समजावून थकले म्हणून तुमच्यापासून खूप दूर जात आहे. याला जिम्मेदार तुम्ही आहात संदीप. तुम्हाला वेळ मिळत नाही. आता तुम्हाला सुट्टी घ्यायीच गरज पडणार नाही. उद्या रविवार आहे. माझ्या अंत्ययात्रेला या. तुमची मयुरी नवरी बनून तयार आहे, तुम्ही दिलेली साडी घालून. तुम्हाला माझा जो फोटो आवडायचा तशीच तयार झाली आहे. या वेळ काढून. तुम्ही मला मजबूर केले म्हणून मी तुमच्यामुळे आत्महत्या करत आहे, असे या चिठ्ठीत नमूद आहे. दरम्यान, मयुरी मेंढेच्या माहेरच्या लोकांनी तिच्या नवऱ्यावर गंभीर आरोप केलेत. नवऱ्याकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासामुळेच मयुरीने हे पाऊल उचलले असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी मयुरीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी | मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयात १९८८ ते २००१ या काळात शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसम्मेलन आयोजित करण्यात आले होते. तब्बल २५ ते ३७ वर्षांआधी ज्या महाविद्यालयात आपण शैक्षणिक धडे घेतले, त्याच महाविद्यालयात आजच्या या अधिकारी-कर्मचाऱ्यांन ी वर्ग भरविला. तत्कालीन प्राध्यापकांसह हितगुज करीत या मंडळीने महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी मदतीचा हातही पुढे केला आहे. महाविद्यालयातील वर्गात हितगुज केल्यानंतर सर्वांनी सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणस्थळी असलेल्या झिरो प्वाईंट या हॉटेलमध्ये विविध स्पर्धात्मक कार्यक्रमही घेतले. त्यावेळी विद्यार्थी असलेल्या अनेक जण सध्याचे यशस्वी उद्योजक, अधिकारी, कर्मचारी आहेत. या सर्वांनी आपापसांत विचारांची देवाण-घेवाण करुन एकदुसऱ्यासोबतच महाविद्यालयाला कशी मदत करता येईल, याबाबतचे नियोजन केले. स्नेहमिलन सोहळ्यातून जिव्हाळा जपल्या जातो. जुन्या स्मृतींना उजाळा दिल्या जातो. यासाठी दिवसभर ‘तेरे जैसा यार कहाँ’, ‘सलामत रहे दोस्ताना हमारा’... अशा प्रकारची गाणी गायली गेली. काहींनी विविध प्रकारचे खेळ, आणि नृत्य सादर करीत आनंद घेतला. त्यामुळे अख्खा दिवस कसा गेला, हे कळलेच नाही, अशा अनेकांच्या प्रतिक्रिया होत्या. या अविस्मरणीय कार्यक्रमाला दर्शन रावणगावकर, संतोष भेलाऊ, राजेश घोडकी, मनोहर चौधरी, गजानन वानखडे, रवींद्र इंगळे (अमरावती), ॲड पवन अकर्ते, हेमंत साबू, विनोद मेश्राम, दीपक ठाकूर, योगेश वानखडे (सौदी अरेबिया), दुर्गा ठक्कर (मुंबई), रूपाली मेश्राम (चंद्रपुर) आदींनी हजेरी लावली होती. काहींची धुरंदर एंट्री यावेळी मित्रांचा आनंद ओसंडून वाहत होता. काही मित्रांच्या डोळ्यात आनंदाश्रू भरून आले तर काही मित्रांनी धुरंदर फ़िल्म स्टाइलने एंट्री केली हा क्षण एवढा आनंदी होता की तो गगनात मावेनासा झाला. दरम्यान एकमेकांचा निरोप घेतांना पुन्हा भेटूया.. म्हणत सर्वांनी पुन्हा एकत्र येण्याचा मानस व्यक्त केला. हा क्षण एवढा भावनिक होता की काही मित्रमंडळी गहिवरली. शेवटी सर्वांनी एकमेकांना निरोप देत स्नेहमिलन सोहळ्याची सांगता करण्यात आली.
शासकीय यंत्रणेला जबाबदार नागरिक म्हणून सहकार्य हवे:किरीट सोमय्या
प्रतिनिधी | अमरावती ‘द इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स', अमरावती येथे भाजपच्या वतीने मतदार यादी अद्ययावत करणे आणि बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने ‘विशेष गहन पुनरीक्षण' कार्यशाळेचे आयोजन रविवार ५ रोजी करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना विशेष गहन पुनर्निरीक्षण (एसआयआर) देशाच्या दृष्टीने कसे महत्त्वाचे आहे. त्यात शासकीय यंत्रणेला एक जबाबदार नागरिक म्हणून सहकार्य करणे कसे आवश्यक आहे, हे समजावून सागितले. सर्व कार्यकर्त्यांनी या राष्ट्रीय कार्यक्रमात सक्रिय सहभागी व्हावे असे किरीट सोमय्या यांनी आवाहन केले. या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदेश संयोजक किरिट सोमय्या, सोबत सह संयोजक नितीन भुतडा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच यावेळी खा. डॉ. अनिल बोंडे, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष रवीराज देशमुख,भाजप जिल्हाध्यक्ष मेळघाट प्रभुदास भिलावेकर भाजपा पदाधिकारी व भाजपा बूथ बीएलए आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनिधी | अमरावती मतदार यादीचे सखोल पुनरिक्षण करुन ती अगदी निर्दोष व निकोप व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने विशेष मोहीम आखली आहे. ही मोहीम थेट नागरिकांच्या दारापर्यंत केव्हा पोहोचणार हे अद्याप ठरायचे असले तरी त्याची पूर्वतयारी मात्र सुरु झाली आहे. या पूर्वतयारीसाठी सध्याच्या यादीची सन २००२ च्या यादीशी जुळवणूक (मॅपींग) सुरु आहे. हे काम ब्लॉक लेवल ऑफीसर (बीएलओ) असलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून केले जात असून त्यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक मॅपिंग पूर्ण करणाऱ्या सुपरवायझर व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. टॉप टेन ठरलेल्या या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज आणि उपजिल्हाधिकारी (महसूल) विवेक जाधव यांच्या हस्ते या बीएलओंना पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. यामध्ये पर्यवेक्षक वसीम फरहत, अविनाश देशमुख व जयश्री गजभिये (पर्यवेक्षीय अधिकारी) यांच्यासह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी वृषाली मोहोड (९९.७८ टक्के), सारिका काळे (९१.९० टक्के), प्रज्ञा मोकळे (९२ टक्के), अभय मुळे (९१ टक्के), शिवलाल बोरकर (९७ टक्के), वैशाली मोरे (९८.०४ टक्के) आणि हर्षल गिरकुंजे (९५.४२ टक्के) यांचा समावेश आहे. इतरांसाठी ‘रोल मॉडेल’ क्षेत्र भेटीदरम्यान इतर बीएलओंशी हितगुज करताना अप्पर जिल्हाधिकारी गोविंद दानेज आणि उपजिल्हाधिकारी विवेक सोळंके यांनी त्या कामगिरीला ‘रोल मॉडेल’ ची उपमा दिली आहे. त्यांच्यामते इतर बीएलओंनीसुद्धा अशीच कामे करुन प्रशासनातर्फे कौतुकाची थाप मिळवावी. सुपरवायझर आणि बीएलओ म्हणून ज्यांनी उत्कृष्ट काम केले, त्यांच्याकडून इतरांनी टिप्स घ्याव्या, अशी सूचनादेखील ते या भेटीदरम्यान देत आहेत.
प्रतिनिधी | घाटलाडकी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर लादलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जाणवत असलेले सिलींडरच्या तुटवड्याचे लोण आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. मोर्शी तालुक्यातील अंबाडा, घाटलाडकी भागातील नागरिकही या समस्येचा सामना करित असून गेल्या महिनाभरापासून सिलींडर मिळत नसल्याची या भागातील नागरिकांची ओरड आहे. गॅस सिलींडरच्या तीव्र तुटवड्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. घाटलाडकी परिसरात भारत गॅस एजन्सीकडून मोठ्या प्रमाणावर गॅस सिलींडरचे वितरण करण्यात आले होते. परंतु मागील महिन्यापासून गॅसच्या गाड्या ग्रामीण भागात येत नसल्याने नागरिकांना तब्बल ६० किलोमीटर अंतर पार करून पुन्हा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. तसेच एचपी गॅस ग्राहकांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सिलींडर मिळवावे लागत आहे. दरम्यानी दिवसभर मजुरी सोडून गॅससाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसानही होत आहे. सिलींडर वेळवेर मिळत नसल्याने मानसिक त्रास तर सर्वांचाच वाढला आहे, सोबत आता वेळही भरपूर द्यावा लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंडसुद्धा सहन करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण महिलांना याचा मोठा फटका बसत आहे.श हरी महिलांच्या तुलनेत गावातील महिलांसोबत दुजाभाव होत असल्याचा स्त्री शक्तीचा आरोप आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. कालमर्यादा अन्यायकारक सध्याच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने दोन सिलींडरमधील अंतर खूप वाढवले आहे. शहरी भागासाठी २५ दिवस आणि ग्रामीण भागासाठी ४५ दिवस केले आहे. मुळात खेड्यातील घरांमध्ये राहणाऱ्यांची संख्या शहराच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही नियमित गॅस पुरवठा व्हावा. महिलांचे आरोग्य सुधारावे, त्या धुरमुक्त वातावरणात जगाव्यात या उद्देशाने केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेद्वारे गॅस कनेक्शन देण्यात आले होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत त्याच महिलांवर पुन्हा चुलीचा वापर करण्याची वेळ ओढवली आहे. गॅस सिलींडर मिळत नसल्याने महिलांनी पुन्हा आपला मोर्चा सरपण गोळा करण्याकडे वळविला असून चुली पेटविल्या आहेत.
अमरावती | बडनेरा-अमरावती महामार्गावरील राजापेठ उड्डाणपुल आहे. हा उड्डाणपुल बडनेराकडून अमरावतीकडे पुढे जाताना दोन दिशांनी खाली उतरतो. एक दिशा राजकमल चौकाकडे जाते तर दुसरी कंवरनगरच्या दिशेने उतरते. कंवरनगरच्या याच दिशेने उड्डाण पुल ज्या ठिकाणी संपुष्टात येतो, त्याठिकाणी दोन्ही बाजूंनी ट्रम्पेट ट्री बहरली आहे. अत्यंत आकर्षक दिसणाऱ्या या झाडाला याच काळात फुले येतात. ही फुले बहरल्याने उड्डाणपुलासह रस्त्याचे सौंदर्यही खुलले आहे. (छायाचित्र : रवींद्र लाखोडे.
प्रतिनिधी | नांदगाव खंडेश्वर चैत्र महिन्याच्या निमित्ताने श्री.क्षेत्र अंबादेवी संस्थान, माहुली देवी येथे श्रीमद् देवी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहादरम्यान दररोज पारायण, भजन संध्या, हरिपाठ तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला. या धार्मिक सप्ताहाची सांगता हनुमान जयंतीच्या दिवशी करण्यात आली. याच दिवशी हनुमान जयंतीचा विशेष कार्यक्रमही भक्तिमय वातावरणात पार पडला. तसेच माऊली ग्राम येथे पारंपरिक गाडी ओढण्याचा कार्यक्रमही उत्साहात झाला. संपूर्ण कार्यक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने गावात आनंदाचे व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे राजेंद्र सरोदे यांनी मनःपूर्वक आभार मानले.
प्रतिनिधी | अमरावती आंबेडकरी तत्त्वज्ञान हे जागतिक चिंतनाचा अविभाज्य भाग झाला असून त्या तत्वज्ञानाला व्यवहारात आणण्यासाठी योगदान देण्याचे महत्वाचे कार्य आताच्या पिढीने करावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांनी केले. साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांच्या गौरवार्थ आंबेडकरी विचार समितीतर्फे दोन दिवसीय साहित्यिक मेजवानीचे (संगीती) आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या संगीतीचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक-विचारवंत मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉ. महेंद्र भवरे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून का.रा. वाल्देकर, इ.मो. नारनवरे, नरेंद्र शेलार, बबन चहांदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्घाटक प्रा. डॉ. भवरे म्हणाले, आंबेडकरी चळवळ अत्यंत व्यापक आहे. अध्यक्षीय भाषणात ताराचंद्र खांडेकर यांनी समकालीन प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली. ते म्हणाले, आंबेडकरी विचार हा सर्वकालिक कल्याणकारी विचारांची खरी ओळख करुन देणारा विचार आहे. त्यातून नवीन समाज घडविण्याची प्रक्रिया सुरू होते. यावेळी प्रमुख अतिथींनीही आपले विचार मांडले. फुले आंबेडकरांचे विचारातून या देशाचा उत्कर्ष साधता येईल असा त्यांच्या मांडणीचा सार होता. यानिमित्ताने आंबेडकरी गझल जागर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. इ.मो .नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्याआले या कार्यक्रमात नंदकुमार दामोदरे, सुदाम सोनुले, संजय घरडे, रोशन गजभिये, देवीलाल रौराळे, अतुल ढोणे, अनिल अघम, विनोद बागडे यांनी आपल्या गझल प्रस्तुत केल्या. सूत्रसंचालन स्नेहल सोनटक्के हिने केले तर आभार कुंदा सोनुले यांनी मानले. दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचा प्रारंभ कवी संमेलनाने करण्यात आला. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गोविंद वाघमारे हे होते. संमेलनात बबन चहांदे, मोरेश्वर सहारे, नारायण थोरात, गौतम ढोके, गणेश लांडगे, संजय मोखडे यांनी आपल्या रचना सादर केल्या. प्रा. सुखदेव ढाणके, नरेंद्र शेलार आदींनी आंबेडकरवादी अर्थशास्त्रीय व श्रमिक कल्याण विषयक विचारांचा परामर्श घेतला. परिसंवादाचे संचालन प्रा.डॉ. गजानन बनसोड यांनी केले. आभार सुदाम सोनुले यांनी मानले. २००० नंतरचे आंबेडकरी साहित्य इसवी सन २००० नंतरचे आंबेडकरी साहित्य या विषयावर आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी बबन चहांदे यांचे अध्यक्षतेखाली अभ्यासपूर्ण चर्चा केल्या गेली. या परिसंवादात आंबेडकरी साहित्यातील समीक्षा व सौंदर्यशास्त्रीय लेखन या विषयावर बोलताना प्रा डॉ अशोक इंगळे यांनी इसवी सन दोन हजार नंतरचे समीक्षा लेखन व सौंदर्यशास्त्रीय लेखनाचा चिकित्सकपणे आढावा घेतला याच परिसंवादात प्रा. डॉ. भास्कर पाटील यांनी आंबेडकरी साहित्यातील वैचारिक लेखन विश्वात व्यापकपणे होणाऱ्या वैचारिक चिंतन या लेखनाचा आढावा घेतला. तर डॉ. शांतरक्षित गावंडे यांनी इसवी सन २००० नंतरचे आंबेडकरी नाट्यलेखन व रंगभूमी याविषयी सविस्तर भाष्य केले.
प्रतिनिधी | मोर्शी येथील पंचायत समिती कार्यालय व श्री शिवाजी उच्च माध्यमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील शिक्षकांकरिता शिक्षण परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी उच्च माध्यमिक शाळेच्या रंगमंदिरात आयोजित या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे यांनी मार्गदर्शन केले. मोर्शीे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम, गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे, शाळा निरीक्षक मधुकरराव रोडे, मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गायकवाड, संदीप बोबडे, विनोद गाडे, मुरलीधरराव डहाणे, शाळा तपासणी अधिकारी निळकंठ यावले, पर्यवेक्षक विठ्ठल नवरे, गजानन चौधरी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जालंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेने आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी झेप घेतली व जगातील दहा शाळांमध्ये आपला क्रमांक कसा प्राप्त केला. त्यासाठी त्या शाळेला कोणकोणते बदल करावे लागले याविषयी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये बाबळेवाडी व जालिंदर नगर येथील जिल्हा परिषद शाळांचा कायापालट करून त्या शाळांना जागतिक दर्जाच्या शाळा बनवल्या. त्यांच्यामते जोपर्यंत पालकांचा सहभाग घेतल्या जात नाही, तोपर्यंत शाळांमध्ये परिवर्तन घडवून आणणे शक्य होत नाही. यावेळी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल शिवाजी उच्च माध्यमिक शाळेचा गौरवही करण्यात आला. तसेच तालुक्यामध्ये खाजगी शाळांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त शाळा तसेच जिल्हा परिषद अंतर्गत प्रथम तीन क्रमांक प्राप्त शाळांचा मान्यवरांच्या शुभहस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रेमा नवरे यांनी, तर आभार ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले.
गुप्तधनासाठी खोदला खड्डा; ५ जणांवर गुन्हा:सुरक्षारक्षक वेळीच पोहोचल्यामुळे हा प्रकार उघड
प्रतिनिधी | अमरावती अंजनगाव सुर्जी तालुक्यात दहिगाव रेचा येथे एक साखर कारखाना आहे. या साखर कारखान्याच्या परिसरात देवीचे मंदिर आहे. या मंदिरापासून काही अंतरावर गुप्तधन शोधण्याच्या प्रयत्नात गड्डा खोदण्यात आला. पोलिसांना त्या ठिकाणी गड्डा खोदण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले. पूजेचे साहित्यही मिळाले. हा प्रकार कारखान्यातील सुरक्षारक्षकाच्या लक्षात येताच त्याने अंजनगाव सुर्जी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तात्काळ एका मांत्रिकासह चौघांना पकडले. हा प्रकार तीन एप्रिलला उशिरा रात्री घडला. या प्रकरणी चार एप्रिलला गुन्हा दाखल झाला आहे. मोहम्मद शाकीर मोहम्मद राजीक (६०, रा. अंजनगाव सुर्जी) असे तक्रारदार सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी रवींद्र मारुती जामकर (२९), सुधाकर सुरेश काळे (३८), मनोहर लक्ष्मण येवले (२५, तिघेही राहणार जनुना ता. चिखलदरा) आणि मांत्रिक राजाराम गंगाराम सावलकर (६२, रा. चौसरमल) या चौघांना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांना सूचना पत्र देऊन सोडण्यात आले आहे. याचवेळी एक मांत्रिक पसार आहे. पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा येथे उर्वरित,पान ४ पकडलेल्या चौघांमध्ये एका तरुणाचा समावेश पायाळूच्या मदतीने गुप्तधन मिळते, या समजातून मांत्रिकाच्या मदतीने हे चौघे देवीच्या मंदिरासमोरच गड्डा खोदून गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणात पाच जणांचा सहभाग आहे. त्या ठिकाणी त्यांनी पूजेचे साहित्यसुद्धा आणले होते. सुरक्षारक्षक वेळीच पोहोचल्यामुळे हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी पोलिस सखोल तपास करत आहेत.
बारामती पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार या अर्ज भरणार आहेत. बारामतीची ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मंत्री भरणे यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतल्यानंतर हाके यांनी माघार घेतली आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीकडून कॉंग्रेस पक्षाने आपला उमेदवार दिला आहे. या सगळ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बिनविरोधचा पॅटर्न बदलला आहे. तसेच महाराष्ट्रातली संवेदना भाजपल्या काळात मारून टाकली असल्याची टीका राऊत यांनी केली. संजय राऊत म्हणाले, सुनेत्राताई पवार यांनी स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांच्या शुभेच्छा घेतल्या. आता आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. तिकडे कॉंग्रेसने उमेदवार उभा केल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवारांची आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली, ही चर्चा आम्हाला पाठिंबा द्या यासाठीच असणार. अशाच प्रकारचा फोन त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनाही केला. छगन भुजबळ आणि त्यांचे काही नेते शरद पवारांनाही भेटले. त्यामुळे हा निर्णय उद्धव ठाकरेंचाच नाही. बारामती हा पवारांचाच गड आहे, तिथे काय निकाल लागणार हे सगळ्यांना माहीत आहे. परंतु, राजकारणात निवडणुकांत काही विषय असतात ते सामोपचारानेच घ्यावे लागतात. आज सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत, निवडणुकांना वेळ आहे. बिनविरोध पॅटर्नला कॉंग्रेसचा विरोध पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, कॉंग्रेसने उमेदवार दिला आहे. आत्ता अर्ज भरला आहे मग अर्ज मागे घ्यायची वेळ येते, मग निवडणुकांचा प्रचार होणार. तिथे शिवसेनेचा उमेदवार आहे का? नाही. शरद पवारांचा उमेदवार आहे का? नाही. परंतु, महाविकास आघाडीमधला प्रमुख घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसने तिथे उमेदवार घोषित केला आहे. कॉंग्रेसची एक भूमिका आहे की शक्यतो बिनविरोध निवडणुका होऊ नयेत. असाच विरोध देवेंद्र फडणवीस यांनी अनेकवेळा केला आहे. नांदेडला कॉंग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण वारले. तेव्हा आम्ही सगळ्यांना विनंती केली होती की बिनविरोध होऊन जाऊ द्या. तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी तिथे उमेदवार दिला आणि अमित शहांपासून अनेक नेते तिथे प्रचार करण्यासाठी आले. पंढरपूरला भालके नानांचे निधन झाले, पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी उभ्या होत्या. आम्ही सगळ्यांना विनंती केली की बिनविरोध व्हावी. काय झाले? देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार दिला. अशा अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवार दिला. जेव्हा त्यांची सोय असते तेव्हा ते बिनविरोध होऊ द्या म्हणतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. भाजपच्या काळात महाराष्ट्रातली संवेदना मारून टाकली संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी बिनविरोधचा पॅटर्न जो आहे तो बदलला आहे. पूर्वी या महाराष्ट्रात एक संवेदनशीलता होती. भाजपच्या काळात ही संवेदना मारून टाकली. नाहीतर एकमेकांशी आम्ही अशा प्रकारची नाती संगळ्यांनीच जपली होती. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे राज्य आणि देशात शहा मोदी यांचे राज्य आल्यापासून देशातली आणि महाराष्ट्रातली संवेदना पूर्णपणे मारली गेली. तरीही आजही आम्ही एकमेकांशी बोलत असतो. पुढे एकमेकांशी बोलत आहेत म्हणून ईडी लावतील, अशी खोचक टीकाही राऊत यांनी केली.
बारामती पोटनिवडणूक विणविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांची भेट घेतली आहे. लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर भरणे यांनी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर भरणे यांनी आमची सकारात्मक चर्चा झाल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले आहे. लक्ष्मण हाके व भरणे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, आज आपल्या सगळ्यांना माहीत आहे की बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. अजित पवारांचे अपघाती निधन झाले आणि त्यामुळे या राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली. सर्वांशी आपुलकीने वागणारा नेता आज आपल्यात नाही. त्यामुळे ही निवडणूक सुनेत्रा पवार लढवत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी तसेच लक्ष्मण हाके यांनी त्यांना सहकार्य करावे ही विनंती करण्यासाठी आलो. मी चर्चा केली आणि आपण माघार घेणे का गर्जेचे आहे ते त्यांना समजावून सांगितले आहे. हाके सर चांगल्या गोष्टीला नेहमीच पाठिंबा देतात, अशी त्यांची भूमिका राहिली आहे. मला वरिष्ठ नेतृत्वांचे फोन आले- लक्ष्मण हाके यावर पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, हे बघा बारामतीची पोटनिवडणूक लढवण्यासंदर्भात माझी भूमिका ही सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट या बारामतीमध्ये आहे, ही वस्तुस्थिती आहे. असे असताना सुद्धा आम्ही काही प्रशांवर लक्ष वेधून घेण्यासाठी, मी काही कुठल्या पक्षाचा नाही. तरीही मी या पोटनिवडणुकीत मी जो ओबीसी आंदोलक आहे, त्यांच्यासाठी आवाज उठवणारा आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून मी काही गोष्टी आक्रमकपणे किंवा आक्रस्ताळपणे मांड्याचा प्रयत्न करत होतो. असे करत असताना मला वरिष्ठ नेतृत्वांचे फोन आले. त्यानंतर मी थोडा विचार केला. माझी लढाई आहेच. स्वर्गीय दादांच्या बाबतीत सुद्धा मी त्यांना समोर ठेऊन प्रचंड आक्रमक भूमिकेतून प्रश्न मांडत होतो. सुनेत्रा ताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवले आमच्या अनेक मागण्या आहेत. 18 महामंडळ याच सरकारने निवडणुकीपूर्वी घोषित केली होती. मात्र अजूनही याला अध्यक्ष भेटला नाही. मला काही गोष्टी जाणवल्या अन त्यातून मी आक्रमक भूमिका मांडली. मला अनेक वरिष्ठ नेत्यांचा कॉल आला. पण जेव्हा मला सुनेत्रा ताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवले की नाही. एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तसेच माझ्या काही मागण्या नाहीत. मी जे प्रश्न मांडले आहेत मी त्यासाठी लढतच राहणार आहे. निवडणूक हा 10-15 दिवसांचा कालावधी आहे, नंतर आम्हाला आमचे प्रश्न मांडायला खूप दिवस आहेत. लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसेच अजित पवारांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यासाठी मी त्यांना विनंती केली होती. हाके सरांची लढाई सुरू राहिलच. पण मोठ्या मनाने त्यांनी माघार घेतली आहे. सुनेत्रा वहिनींसाठी त्यांनी ही भूमिका घेतली आहे.
स्मार्ट मीटर लपून, बळजबरीने लावणे बंद न केल्यास आंदोलन:महावितरण कंपनीच्या संचालकांना दिले निवेदन
प्रतिनिधी | अकोला महावितरण कंपनीने जुने मीटर बसवून न दिल्यास, स्मार्ट (टीओडी) मीटर लपून व बळजबरीने लावणे बंद न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेने (रघुनाथ दादा पाटील प्रणीत) दिला आहे. याबाबत संघटनेचे नेते लक्ष्मीकांत कौठकर यांनी महावितरण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन दिले. तसेच कंपनीच्या प्रकल्प संचालकांचीही भेट घेतली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात प्रचंड वाढ झाली आहे. आम्हाला कोणतीही सूचना न देता सर्व मीटर बदलण्यात आले. नवीन स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसवून देण्याची मागणी सर्वस्तरातून होत असल्याचे लक्ष्मीकांत कौठकर यांचे म्हणणे आहे. याबाबत वीज ग्राहकांनी आपल्याकडे तक्रारीही केल्या आहेत. दरम्यान, या मुद्द्यावर त्यांनी कंपनीच्या मुंबई येथील मुख्यालयात संचालकांची भेट घेतली. महावितरण कंपनीने ग्राहकांवर अनेकदा अन्याय केला आहे. याबाबत यापूर्वी रास्ता रोको, धरणे आंदोलन यासारखी आंदोलने केल्याचे कौठकर म्हणाले. त्यामुळे आता स्मार्ट मीटरबाबत महावितरणने ग्राहकहिताचा निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी संघटनेकडून दिला आहे. स्मार्ट मीटरच्या अनुषंगाने महावितरण कंपनीने ग्राहकांचा सन्मान राखत जुने मीटर बसवून द्यावेत; अन्यथा वीज ग्राहक संघटित नसल्याने याचा फायदा घेऊन ग्राहकांचा अपमान महावितरण कंपनी करीत आहे, असे गृहीत धरून परिस्थितीनुसार आवश्यकता असल्यास ग्राहकांचा असंतोष पाहता तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. या मीटरविरोधात काही संघटना हायकोर्टमध्येही गेलेल्या आहेत. हे मीटर बसवताना ग्राहकांना पूर्वसूचना का दिली नाही, असा प्रश्नही उपस्थित होतो, असे कौठकर यांचे म्हणणे आहे. यापूर्वी झाली होती सभा : स्मार्ट वीज मीटरबाबत काही दिवसांपूर्वी तेल्हारा तालुक्यात सभाही झाल्या होत्या. नवीन मीटर काढून जुने मीटर बसवून देण्याची मागणी ग्राहकांनी केली होती. आम्हाला विश्वासात घेण्यात आले नाही, असा सवाल ग्राहकांनी सभेत केला होता. तसेच नादुरुस्त मीटरच्या जागी स्मार्ट मीटर (प्रीपेड मीटर) बसवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मीटर रीडिंग घेणारे, वीज बिल वाटप करणारे कंत्राटी कामगार यांचे काम जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आमच्यावर येणाऱ्या काळात बेरोजगारीची वेळ येऊ शकते, असे कामगारांचे म्हणणे होते. एकीकडे स्मार्ट मीटरला कामगारांचा विरोध आहे. सामान्य ग्राहकांकडूनही जुन्याच मीटरची मागणी होत आहे, असे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मीटरचा ग्राहकांना अधिकार सन २००३ च्या वीज वितरण कायद्यातील कलम ५५ प्रमाणे मीटर निवडण्याचा अधिकार हा ग्राहकांचा आहे, असे शेतकरी संघटनेच्या कौठकर यांनी निवेदनात नमूद केले. महावितरण कंपनी ग्राहकांच्या अधिकारावर अतिक्रमण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महावितरणने वीज ग्राहकांना विश्वासात न घेता बळजबरीने स्मार्ट (टीओडी) मीटर बसवले आहेत. मीटरांची किंमत २७ हजार कोटी आहे. पैकी दोन हजार कोटी केंद्र सरकारचे अनुदान आहे. उर्वरित २५ हजार कोटी ग्राहकांकडून वसूल केले जाणार आहेत. प्रत्येकी प्रति ग्राहक ११ हजार ९०० चा बोजा ग्राहकांवर पडणार आहे, असे कौठकर म्हणाले. ...तर राज्यव्यापी आंदोलन वीज वितरण कायदा २००३, कलम ५५ नुसार मीटर निवडण्याचा अधिकार आहे. ग्राहकाला पूर्वसूचना न देता बळजबरीने कंपनी वीज ग्राहकांवर अन्याय करीत आहे. लवकरात लवकर जुने मीटर बसवून न दिल्यास, स्मार्ट मीटर लपून व बळजबरीने लावणे बंद न केल्यास विदर्भ, तसेच गरज भासल्यास राज्यव्यापी आंदोलन करणार.- लक्ष्मीकांत कौठकर, विदर्भ अध्यक्ष, शेतकरी संघटना
प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आणि बेकायदेशीर दारूच्या भट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार'' सुरू केले आहे. पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, ३ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ ते रात्री १२ या वेळेत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्हाभरातील ७५ ठिकाणी अवैध दारू विक्री आणि बेकायदेशीर दारूच्या भट्ट्यांवर छापे टाकण्यात आले. ही मोहीम जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांअंतर्गत राबवण्यात आली. या मोहिमेत पोलिसांनी बेकायदेशीर दारूच्या ४६ केसेस केले आणि २लाख ३ हजार ५६२ रुपये किमतीचा माल जप्त केला. बेकायदेशीर दारूच्या भट्ट्यांवरील २९केसेसच्या कारवाईत ५ लाख ९९ हजार ३७० रुपये किमतीचा माल जप्त करुन असा एकूण ७५ केसेसमध्ये सुमारे ८ लाख २ हजार ९३२ रूपये किमतीचा माल नष्ट करण्यात आला, भट्ट्या पाडण्यात आल्या आणि कच्च्या मालाची विल्हेवाट लावण्यात आली. बेकायदेशीर व्यवसायात गुंतलेल्यांवर दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी पोलिसांतर्फे ही मोहीम राबवली जात आहे. पोलिसांचा असा विश्वास आहे की, अवैध दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो, तसेच ग्रामीण भागातील शांतता भंग होऊन अशांतता पसरते. दारू गाळण्याच्या कारखान्यांविरुद्धची ही मोहीम जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहे. कोणत्याही गुन्हेगारी कृत्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी.
राणी सती धाममध्ये सुंदरकांड:हनुमान जयंतीला भक्तीचा जागर
प्रतिनिधी | अकोला राणी सती धाममध्ये हनुमान जयंती पर्वावर सुंदरकांड संपन्न झाले. यामध्ये राणी सती सुंदरकांडच्या ४७ सदस्यांनी सहभाग घेत सामूहिक सुंदरकांड सादर केले. हनुमान जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी धाममधील पंचमुखी हनुमान मंदिरात अभिषेकने झाला. यात अभिषेक यजमान वसंत बाछुका, मनीष बाछुका, किशोर बाछुका, शिवम शिंघाणीया यांनी सहभाग घेतला. दुपारी सुंदरकांड यजमान पुरुषोत्तम अग्रवाल हातरूणवाले यांच्या उपस्थितीत सामूहिक सुंदर कांड संपन्न झाले. प्रसाद वितरणात अजय अग्रवाल, फुलचंद पटवारी व आरती मंडळाच्या महिलांनी सहभाग घेतला. राणी सती सेवा समितीचे अध्यक्ष जगदीश बाछुका यांच्या अध्यक्षतेत तथा सचिव नवीन झुनझुनवाला यांच्या उपस्थितीत संपन्न या सुंदरकांड सोहळ्यात रमेश शर्मा, फुलचंद पटवारी, प्रदीप गोयनका, हंसराज अग्रवाल, रमेश गुप्ता, दिलीप वानखडे, प्रेम चौरसिया, सतीश गाडोदिया आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. सोमवार, 6 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आपला अर्ज दाखल करणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे. मंत्री दत्तात्रय भरणे हे ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांची भेट घेऊन त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लक्ष्मण हाके हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना भरणे म्हणाले, मी सुनेत्रा पवार यांच्या वतीने हाके सरांना भेटायला आलो आहे. शेवटी ही जागा अपघाताने पोटनिवडणूक आहे. आपण ही जागा सुनेत्रा वहिनींना सहकार्य करावे, सुनेत्रा वहिनींसाठी माघार घ्यावी ही विनंती करण्यासाठी मी आलो आहे. पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, माझी आज पहिलीच भेट आहे. त्यांना मी 3-4 वर्षांपूर्वी भेटलो आहे. शेवटी ही निवडणूक बारामतीची आहे. बारामतीसाठी अजितदादांनी खूप काही केले आहे. राज्यासाठी केले आहे. आपल्या नेत्याला जर श्रद्धांजली वाहायची असेल तर हाके सरांना विनंती करणार आहे की उमेवारी मागे घ्यावी. तसेच मी कॉंग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांना देखील भेटणार आहे. त्यांच्यासाठी अजितदादांनी काय केले आहे हे त्यांनाही माहिती आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी कन्हेरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे- रोहित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळे उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य करतील असा विश्वास आहे, परंतु तसे झाले नाही तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत, असे समजून बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन करतो! तुमचे एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल..!, अशी भावनिक साद रोहित पवारांनी घातली आहे.
समाजात एकोपा, प्रगतीसाठी डॉ. आंबेडकर, अण्णाभाऊ साठेंचे विचार केंद्रस्थानी ठेवा:आंबेडकरी मातंग परिषद
प्रतिनिधी | सोलापूर दलित चळवळीत मातंग समाजाचे योगदान आहे. समाजात एकोपा, प्रगतीसाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श, विचार केंद्रस्थानी ठेवा, आचरण करा असे विचार विविध मान्यवरांनी याप्रसंगी बोलताना मांडले. भगवान गौतम बुध्द, शाहू, फुले,आंबडेकर यांचा वारसा जपा असा संदेश देण्यात आला. रविवारी डॉ. फडकुले सभागृहात आंबेडकरी मातंग परिषद' सोलापुरात पार पडले. राज्यभरातून आलेल्या मान्यवरांनी विचार मांडले. पुण्याचे ज्येष्ठ विचारवंत रमेश राक्षे यांच्या हस्ते उद॰घाटन झाले. कोल्हापूरचे विचारवंत प्रा. शरद गायकवाड अध्यक्षस्थानी होते. परभणीचे विकास पाथरीकर, अंबाजोगाईचे अशोक पालके, पंढरपूरचे सुनील अडगळे, श्रीकांत कसबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पहिल्या सत्रात या मान्यवरांनी बहुजन महापुरुषांच्या चळवळीत मातंग समाजाचे सक्रीय योगदान व सदयस्थिती' या विषयावर मते मांडली. आयोजक जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी प्रस्तावनेत विचार मांडताना म्हणाले,\दलित चळवळीत मातंग समाजाचे मोठे योगदान आहे. {रमेश राक्षे- जागृती आवश्यक आहे. महिलांची संख्या अशा कार्यक्रमात वाढली पाहिजे. कारण विचारांचा प्रसार त्यांच्याकडूनच शक्य आहे. तळागाळात विचार गेल्यानंतरच चळवळ उभी राहील. विकासासाठी सगळ्यांनी एकत्र यावेत. {विकास पाथरीकर- प्रतिकूल परिस्थितीतही मातंग समाज नेहमी योगदान देत आलाय. लहुजी साळवे, मुक्ता साळवे यांचे कार्य स्मरण ठेवा. शिक्षण, आरक्षण याबाबत जागृत पाहिजे. डॉ. बाबासाहेब व अण्णाभाऊ साठे यांचे विचार डोळ्यासमोर ठेवा. जागतिकीकरण, उदारीकरण वाढताना, जगण्याचे प्रश्न गंभीर होत आहेत. काही करायला जा रांगा वाढत आहेत. याला विकास म्हणायच का? {सुनील अडगळे - समाजातील गरजूंना मदत करा. अनेकजण मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. सोशल मिडीया व अन्य माध्यमातून जग जवळ आलं म्हणतो. पण, गरीबांची व्यथा आपणाला कळाली का? , नाही असे उत्तर आहे. प्रगतीसाठी आपण लढा. ३१ डिसेंबर १९३७ साली डॉ. आंबेडकर करकंब गावात आले होते. त्याप्रसंगी मातंग समाजाला प्रबोधन केल्याची आठवण सांगितली. { अशोक पालके - मुक्ता साळवे यांचे विचार पुढच्या पिढीकडे नेण्याची गरज आहे. आदर्श आपल्यासमोर राहावा. सामाजिक बांधिलकी जपा. शिक्षणाला महत्व दया.
प्रतिनिधी | आळेफाटा आकाशातून आग ओकणारा सूर्य आणि जमिनीवर दाटलेलं दुष्काळाचं सावट... या दुहेरी संकटात आळेफाटा परिसरातील ग्रामीण अर्थकारणाने कूस बदलली आहे. एकेकाळी जनावरांचा साधा चारा समजला जाणारा 'कडबा' आता शेतकऱ्यांसाठी अक्षरशः 'पांढरं सोनं' ठरत आहे. बाजारात कडब्याचे दर गगनाला भिडले असून, प्रति शेकडा ४ ते ५ हजार रुपयांच्या विक्रमी दराने कडब्याची विक्री होत असल्याने शेतीचा नवा 'ट्रेंड' समोर आला आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने ज्वारीचे उत्पादन घटले आहे. मात्र, जी काही थोडीफार ज्वारी हाताशी आली, तिचे दाणे पाखरांपासून वाचवणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी आता दाण्यांऐवजी केवळ 'कडबा' उत्पादनावरच लक्ष केंद्रित केले आहे. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना, कडब्याच्या विक्रीतून मिळणारा हा 'आर्थिक बुस्टर' शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. हिरवा चारा आटल्याने दुग्ध व्यावसायिकांची मोठी गोची झाली आहे. जनावरे जगवण्यासाठी सुका चारा हवाच, या अट्टाहासापोटी व्यापारी आणि पशुपालक आळेफाटा परिसरात मिळेल त्या भावाने कडबा खरेदी करत आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर मोठी स्पर्धा निर्माण झाली असून, दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. पशुपालकांच्या डोळ्यात पाणी! एकीकडे कडबा विक्रीतून काही शेतकऱ्यांचे खिसे गरम होत असले, तरी दुसरीकडे पशुपालकांचे कंबरडे मोडले आहे. दुधाला अपेक्षित दर नसताना चाऱ्यासाठी करावा लागणारा प्रचंड खर्च परवडणारा नाही. टँकरने पाणी आणि हजारो रुपये खर्चून चारा विकत घेताना दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कडबाच बनला मुख्य उत्पन्नाचा आधार ज्वारीचं उत्पादन कमी झालं,पण कडब्याच्या विक्रीमुळे काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळतोय, असे आळेफाटा परिसरातील राजेंद्र कुऱ्हाडे या शेतकऱ्याने सांगितले. तर कडब्याला कधीकाळी इतका भाव मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज जनावरे नसलेल्या शेतकऱ्यांसाठी कडबाच मुख्य उत्पन्नाचा आधार बनला आहे, असे शेतकरी सचिन देशमुख यांनी सांगितले.
राहुरी | प्रतिनिधी येळकोट येळकोट जय मल्हार... च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या कडकडाटात राहुरीचे ग्रामदैवत श्री खंडोबा महाराज यात्रा उत्सवाला रविवारी उत्साहात सुरुवात झाली. यंदा यात्रेचे मुख्य आकर्षण ठरली ती मंदिरातील 'द्राक्षांच्या घडांची' मनमोहक सजावट! खंडेरायाचा दरबार द्राक्षांच्या घडांनी सजवलेला पाहून भाविक भारावून गेले. यात्रेची सुरुवात परंपरेप्रमाणे गंगेतून आणलेल्या पवित्र कावड आणि काठी मिरवणुकीने झाली. शहरातील अंबिका माता मंदिरापासून निघालेली ही भव्य मिरवणूक शनि चौक, शिवाजी चौक आणि शुक्लेश्वर चौक मार्गे खंडोबा मंदिरापर्यंत पोहोचली. संपूर्ण मार्गावर गुलालाची उधळण आणि जय मल्हार, जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यंदाच्या मिरवणुकीत तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. ढोल-ताशांच्या जोडीला बॅन्जो पथकाने मिरवणुकीत रंगत भरली. ठिकठिकाणी भाविकांनी कावडीचे स्वागत केले. खंडोबा मंदिरात पोहोचल्यानंतर खंडेरायाला गंगेच्या पाण्याने अभिषेक घालण्यात आला. मिरवणुकीत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, सचिव सदाशिव शेळके, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, प्रतीक तनपुरे, सोन्याबापू जगधने, विलास वराळे, तुषार पवार यांच्यासह राहुरीतील अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि हजारो भाविक सहभागी झाले होते. खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात आणि परिसरात द्राक्षांच्या घडांची अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. हिरव्यागार द्राक्षांच्या घडांनी सजलेले मंदिर पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अनेक भाविक या अनोख्या सजावटीसमोर सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी गर्दी करत होते. सोशल मीडियावरही या सजावटीचे फोटो व्हायरल होत आहेत. राहुरीची ही यात्रा म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून, सामाजिक एकोप्याचे प्रतीक बनली आहे. द्राक्षांच्या सजावटीने यंदा यात्रेला एक वेगळीच 'गोडी' निर्माण करून दिली आहे.
प्रतिनिधी|आळेफाटा आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव आनंद येथे वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कला महोत्सव कलादर्पण २०२६ मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. विविध संस्कृतींचे दर्शन घडवणारे रंगतदार कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या बहुआयामी कलागुणांमुळे यंदाचा सोहळा विशेष अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते डी. बी. वाळुंज यांनी प्रास्ताविक केले. छाया डुंबरे यांनी सूत्रसंचालनाची धुरा समर्थपणे सांभाळली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे, माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, सरपंच रेलिका जाधव, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तानाजी देवकर उपस्थित होते. कलादर्पण २०२६ अंतर्गत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाटक व एकांकिकांनी उपस्थितांची मने जिंकली. गरबा, लावणी, आदिवासी नृत्य, रेट्रो, वारी, ऑपरेशन सिंदूर आणि छावा यांसारख्या विविध थीमवर आधारित सादरीकरणांनी उपस्थित भारावून गेले. गणेश वंदनेने सुरू झालेला हा सोहळा शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरला. कार्यक्रमात जवळपास २० बक्षिसांचा समावेश असलेल्या लकी ड्रॉ उपक्रमास विशेषतः महिला वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळाला. आभाळे कुटुंबीयांच्या सहकार्याने सादर करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक कुंपण या बिबट्यापासून संरक्षणावर आधारित नाटिकेद्वारे प्रभावी जनजागृती करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थी व पालकांसाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाहीर गणेश वाघमारे यांनी मोफत साउंड सिस्टम उपलब्ध करून दिली, तर आदिका लाइट्स यांनी अत्यल्प दरात लाईट, स्क्रीन व डीजे गाडीची व्यवस्था केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय चौगुले, शिक्षणप्रेमी डी.बी. वाळुंज, मुख्याध्यापक सुनील ठिकेकर, शिक्षक सुनंदा तांबे, गीतांजली वाळुंज आणि सविता खेत्री यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य सपना शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, गोरक्ष देवकर, वैशाली देवकर, निशा वाळुंज, अल्पना देवकर, कल्पना पाटील, संदीप गडगे आदींसह विद्यालयातील विद्यार्थी व पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे झाले कौैतुक कलादर्पण २०२६ अंतर्गत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाटक व एकांकिकांनी उपस्थितांची मने जिंकली. गरबा, लावणी, आदिवासी नृत्य, रेट्रो,वारी,ऑपरेशन सिंदूर आणि छावा यांसारख्या विविध थीमवर आधारित सादरीकरणांनी उपस्थित भारावून गेले.
प्रतिनिधी|कोपरगाव शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवित्र गोदावरी नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्यावतीने रविवारी (दि.५) ‘निर्मल गोदावरी अभियान’ राबविण्यात आले. युवानेते विवेक कोल्हे यांच्या ‘विकासाचा विश्वासनामा’ या संकल्पनेतून साकार झालेल्या या मोहिमेत कोपरगावकर नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गोदावरीचा तीर प्लास्टिकमुक्त केला. रविवारी सकाळी साडेसहा वाजेपासून नगराध्यक्ष पराग संधान यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. शहराच्या विविध भागांतील नागरिक आणि सद्गुरु गंगागीर महाराज कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या मोहिमेत श्रमदान केले. मोहिमेदरम्यान नदीकाठावर साचलेला सुमारे १ हजार किलो प्लास्टिक कचरा आणि निर्माल्य संकलित करण्यात आले. गोदावरी नदी ही कोपरगाववासियांची 'आई' आहे, तिला स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे, असे आवाहन नगराध्यक्ष पराग संधान यांनी यावेळी केले. भविष्यात कचरा निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. नदीकाठावर साचणारा प्लास्टिक कचरा नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याने, येत्या काळात नदीकिनारी स्वच्छता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी नदीपात्र कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त ठेवण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमात माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक, नगरसेवक वैभव आढाव, अनिल आव्हाड, आकाश वाजे, योगेश बागुल, संजय उदावंत, दत्तू पगारे, गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक आदिनाथ ढाकणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकसहभागातून राबवलेल्या या मोहिमेमुळे कोपरगावच्या घाट परिसराने स्वच्छतेचे नवे रूप धारण केले असून, प्रशासनाच्या या भूमिकेचे शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
हिंगोली ते वाशीम मार्गावर अकोला बायपास जवळ हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनासह ४.६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर रविवारी ता. ५ रात्री उशीरा हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूुसार, हिंगोली कडून पिकअप वाहनामध्ये तीन बैल दाटीवाटीने कोंबून वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शामकुमार डोंगरे, उपनिरीक्षक भालचंद्र मेथेकर, जमादार बाळासाहेब खोडवे, विश्वास कुटे, अनिल डुकरे, आशिष उंबरकर, रमेश जाधव यांच्या पथकाने हिंगोली ते वाशीम मार्गावर रविवारी सायंकाळी वाहनांची तपासणी सुरु केली होती. यावेळी पोलिसांनी एक पिकअप वाहन थांबविल्यानंतर त्यात तीन बैल आढळून आले. पोलिसांनी चालक शेख वाहिद शेख मुक्तार (रा. बागवानपुरा वाशीम), शेख मुजीब अहेमद (रा. खडकपूरा हिंगोली) यांची चौकशी सुरु केली. या चौकशीमध्ये त्यांनी जनावरांच्या वाहतुकीचा परवाना व इतर कागदपत्रांबाबत समाधानकारक उत्तरे दिली नाही. तसेच पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र नसतांनाही जनावरांची वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. यावरून पोलिसांनी पीकअप वाहन व तीन बैल असा सुमारे ४.६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आणला. या प्रकरणी जमादार कुटे यांच्या तक्रारीवरून शेख वाहिद व शेख मुजीब या दोघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार बाळासाहेब खोडवे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी तीनही बैल गोशाळेत पाठविण्याची तयारी चालवली आहे.
अशोक खरात भोंदुगिरीसोबतच काळा पैसा पांढरा करण्याचे धंदेही हवाला रॅकेटच्या माध्यमातून करत असल्याचा संशय आहे. त्याचे हवाला रॅकेट पार दुबईपर्यंत पोहोचले होते, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. हे रॅकेट चालवण्यासाठी अशोक खरातने मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेलमधली आलीशान रूम 25 हजार रुपये भाडे तत्त्वावर घेतली होती. इथूनच तो कोट्यवधी रुपयांची देवाण-घेवाण करत होता. यासंदर्भात एसआयटीने केलेल्या तपासात खरातच्या दोन मोबाइलमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक आणि पुणे परिसरातील पाच जणांचा सहभाग असलेल्या एका मोठ्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, यामध्ये बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. मुख्य संशयित अशोक खरात याच्या माध्यमातून जमिनी बळकावणे आणि एका बिल्डरचा तब्बल 300 कोटींचा व्यवहार वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, मोबाईल चॅट, व्हॉइस नोट्स आणि ऑडिओ क्लिप्समधून 'आशीर्वादाच्या' नावाखाली चालणाऱ्या या काळ्या पैशांच्या देवाणघेवाणीचे धक्कादायक पुरावे हाती लागले आहेत. तक्रारदाराच्या आरोपानुसार, देवदर्शनाच्या बहाण्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सहकारी पतसंस्थांमध्ये इतरांचे पॅन व आधार कार्ड वापरून बनावट खाती उघडण्यात आली असून, या संपूर्ण नेटवर्कच्या माध्यमातून जमिनीच्या व्यवहारांत मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशांचा वापर झाल्याचा दाट संशय तपास पथकाने व्यक्त केला आहे. पतसंस्थेत नियमबाह्य पद्धतीने तब्बल 100 खाती उघडली अशोक खरातच्या विरोधात आता आणखी एक नवा गुन्हा दाखल झाला असून, यामध्ये समता पतसंस्थेच्या राहाता शाखेच्या व्यवस्थापकाचाही समावेश आहे. 2021 मध्ये या पतसंस्थेत नियमबाह्य पद्धतीने तब्बल 100 खाती उघडण्यात आली होती, ज्यामधून आतापर्यंत 60 कोटी रुपयांहून अधिक रकमेची संशयास्पद देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली आहे. शिर्डी पोलिसांनी 19 खातेदारांची सखोल चौकशी सुरू केली असता, या मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून खरातने बँकिंग यंत्रणेचा गैरवापर केल्याचे स्पष्ट होत आहे. कोणालाही सोडले जाणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तपासाच्या ओघात अशोक खरातने अनेक निष्पाप लोकांना आपल्या जाळ्यात ओढून अमाप पैसा जमवल्याचे आणि मोठ्या प्रमाणात मालमत्ता गोळा केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि काळ्या पैशाचा वापर पाहता, आता ईडी देखील या घोटाळ्याचा तपास करण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, खरातशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही, असा कडक इशारा दिला आहे. 100 खात्यांवर 'नॉमिनी' म्हणून अशोक खरात कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेतील आर्थिक व्यवहारांच्या तपासात एक खळबळजनक माहिती समोर आली असून, तेथील 57 खातेदारांच्या 100 खात्यांवर 'नॉमिनी' म्हणून थेट अशोक खरात याचेच नाव नोंदवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या सर्व खात्यांशी खरातचाच मोबाईल नंबर जोडलेला असून आतापर्यंत या माध्यमातून सुमारे 60 कोटी रुपयांची मोठी उलाढाल झाली आहे. या खात्यांमध्ये खरात कुटुंबातील 8 खात्यांसह प्रतिभा चाकणकर व अन्य एका चाकणकर नावाच्या व्यक्तीच्या खात्यांचा समावेश असून, यातील 'प्रतिभा' हे नाव महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या नावाशी साधर्म्य दर्शवणारे असल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सटाणा-नामपूर रस्त्यावर दोन झाडे कोसळली:वाहनचालकांना अडथळा, संबंधित विभागाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी |सटाणा तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सटाणा-नामपूर रस्त्यालगत दोन ठिकाणी महाकाय वृक्ष कोसळले आहेत. हे वृक्ष रस्त्याच्या कडेला तसेच पडून असल्याने अपघाताची भीषण शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने याकडे पाठ फिरवल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सटाणा-नामपूर रस्त्यावरील कुपखेडा गावाजवळ आणि शीतगृहाजवळ अशा दोन ठिकाणी रस्त्यालगत झाडे कोसळली आहेत. ही झाडे रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर पडून असल्याने मूळ रस्ता अरुंद झाला आहे. कोसळलेल्या फांद्या आणि खोडामुळे समोरून येणारे वाहन वेळेत दिसत नाही, परिणामी येथे भीषण अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करणे आवश्यक असताना, संबंधित यंत्रणेने अद्याप ही झाडे हटवण्याची तसदी घेतलेली नाही. या मार्गावर रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना या झाडांचा अंदाज येत नसल्याने मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने ही झाडे तातडीने बाजूला करावीत, अशी मागणी वाहनधारकांकडून जोर धरत आहे.
प्रतिनिधी| घोटी घोटी शहरातील दाऊदी बोहरा समाजमंदिरासमोर गेल्या १५ वर्षांपासून रस्ता आणि इतर मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भव्य धर्ममंदिर उभारूनही त्याठिकाणी पोहोचण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने समाजबांधवांना मोठी कसरत करावी लागत असून, प्रशासनाच्या या दुर्लक्षित भूमिकेमुळे आता आगामी निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांतर्फे देण्यात आला आहे. समाजमंदिरासमोर मोठ्या प्रमाणात उघडे गटार असून त्यावर स्लॅब किंवा झाकण नसल्याने परिसरात सतत दुर्गंधी पसरलेली असते. या ठिकाणी दररोज नमाज पठण, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, अस्वच्छतेमुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या कामासाठी वर्कऑर्डर निघालेली असतानाही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.निवडणुका जवळ आल्या की लोकप्रतिनिधी मते मागण्यासाठी येतात, मात्र त्यानंतर समाज मंदिराच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप ट्रस्टच्या सदस्यांनी केला आहे. वारंवार लेखी व तोंडी मागणी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. संबंधित ठेकेदाराला तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी ठाम भूमिका समाजबांधवांनी घेतली आहे. समाजमंदिरासमोरील गटारावर पूर्ण स्लॅब टाकून सुरक्षित रस्ता तयार करावा, तसेच परिसरातील स्वच्छता व पाण्याची सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मुस्तफा भाई बोहरी, आली अजगर बोहरी, खोजेमा बोहरी, होजेफा बोहरी, हकीम बोहरी यांच्यासह ट्रस्टचे सर्व सदस्य उपस्थित होते. रस्त्याचे काम त्वरित करा प्रशासनाकडून दाऊदी बोहरी समाजकार्यालयासाठी निधी मंजूर झाला असला, तरी प्रत्यक्षात कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. निधी कागदावरच असल्याने परिसरातील नागरिकांना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित काम लवकरात लवकर सुरू करावे. -मुस्तफा बोहरी
संदीप बत्तासे | हरसूल त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील तोरंगण हे गाव काही वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून होते. मात्र अवघ्या दीड वर्षांत गावाने पाणीटंचाईवर मात करत बागायती शेतीचा यशस्वी प्रयोग उभा केला आहे. स्वदेश फाउंडेशन आणि आदर्श गाव विकास समिती तोरंगण यांच्या संयुक्त प्रयत्नांतून गावातील सुमारे १००० एकर शेतीपैकी ९२ शेतकऱ्यांनी २०० एकर क्षेत्र ओलिताखाली आणले आहे. ९२ शेतकऱ्यांपैकी १० शेतकऱ्यांनी पारंपरिक भात शेतीबरोबरच काकडी लागवड सुरू केली आहे. सध्या दररोज सुमारे एक टन काकडी नाशिक बाजार समितीत विक्रीसाठी पाठवली जाते. अंदाजे ६० कॅरेटमधून दररोज सुमारे १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. पूर्वी भात शेतीतून वर्षाला सुमारे २० हजार रुपये मिळत होते, तर आता काकडीच्या हंगामात सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू लागले आहे. गावातील शेतकऱ्यांनी गटशेतीची स्थापना करून प्रत्येकी ७६०० रुपये जमा केले. स्वदेश फाउंडेशनने प्रति एकर सव्वा लाख रुपये खर्च करून सौरऊर्जेवर चालणारे पाणीपंप बसवले. गावाजवळून वाहणाऱ्या दीड किलोमीटरवरील रास नदी तसेच देवीचामाळ परिसरातील सुमारे ३ किलोमीटर अंतरावरून पाइपलाइनद्वारे पाणी आणण्यात आले. आठवड्याचे नियोजन करून एक दिवस एका शेतकऱ्याला आणि एक दिवस राखीव पाणी अशा पद्धतीने पाणीवाटप केले जाते. ^कधीकाळी पिण्याच्या पाण्यासाठी गावात टँकर मागवावे लागत होते. आता १०० एकरांहून अधिक क्षेत्र ओलिताखाली आले आहे. रोजगारासाठी स्थलांतर करणारे ग्रामस्थ गावातच बागायती शेती करत आहेत. उर्वरित जमीन ओलिताखाली आणून गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आमचा मानस आहे. - राहुल बोरसे, सरपंच, तोरंगण या पिकांची लागवड काकडीबरोबरच भाजीपाला, भुईमूग, मका, बाजरी, गहू आणि ज्वारी या पिकांची लागवड सुरू झाली आहे.
चाचडगावला ५१ लाख रुपयांचा गुटखा जप्त:दिंडाेरी पाेलिसांची कारवाई; चालक अटकेत
प्रतिनिधी | दिंडोरी नाशिक–पेठ रस्त्यावरील चाचडगाव शिवारात दिंडोरी पोलिसांनी रविवारी (दि. ५) पहाटे धाडसी कारवाई करत गुजरातमधून महाराष्ट्रात बेकायदेशीररीत्या आणला जात असलेला ५१ लाख ७८ हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा व तंबाखू, अंदाजे २० लाख रुपये किमतीचा कंटेनर तसेच ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण ७१ लाख ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत कंटेनर चालकाला अटक करण्यात आली असून वाहनमालक फरार आहे. पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे मविप्र महाविद्यालयासमोर सापळा रचण्यात आला होता. संशयास्पद वाटणारा कंटेनर (एमएच ०५ एएम १८२१) अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. या प्रकरणी मारुती रभाजी वाळुंज (५३, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर, जि. पुणे) या चालकास अटक करण्यात आली आहे. वाहनमालक गणेश सुमंता वाघोले (रा. जुन्नर, जि. पुणे) हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. सदर गुटखा गुजरात राज्यातून कर चुकवून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. उपनिरीक्षक अरुण भिसे, विक्रांत मांगडे, प्रमोद मंडलिक, मिलिंद पाटील, हरिश्चंद्र पालवी, बजरंग कहाटे, बाळासाहेब पानसरे, मोठाभाऊ बच्छाव आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
रमेश शेळके | पैठण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ स्मार्ट कार्ड योजना लागू केली आहे. ज्येष्ठ नागरिकांसह महिला, विद्यार्थी, दिव्यांग प्रवाशांसाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. कार्ड आधार संलग्न आहे. नवीन कार्डासाठी जीएसटीसह शुल्क १९९ रुपये आहे. जुने कार्ड बदलून नवीन स्मार्ट कार्ड घेणाऱ्यांसाठी १४९ रुपये खर्च निश्चित केला आहे. राज्यभरातील बसस्थानके आणि ३ हजारांहून अधिक अधिकृत एजंट्समार्फत नोंदणी सुरू आहे. पैठण एसटी स्थानकातही यासाठी एक कक्ष तयार केला आहे. येथे १९९ ऐवजी ३०० रुपये आकारले जात असल्याचा आरोप आहे. या स्मार्ट कार्डमुळे सवलतीचा प्रवास अधिक पारदर्शक, सुलभ होणार आहे. ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा याच कार्डद्वारे मिळणार आहे. इतर वयोगटांनाही सवलतीचा लाभ डिजिटल पद्धतीने मिळेल. हे कार्ड प्रीपेड वॉलेटप्रमाणे काम करणार आहे. प्रवासी रिचार्ज करून तिकीट व्यवहार करू लूट थांबवा, अन्यथा धडा शिकवू ः राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू परदेशी, बजरंग लिंबोरे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांना अडवून ठेवू नका. कार्डसाठीचे अडथळे दूर करा. केंद्र वाढवा, कोणत्याही प्रकारची लूट करू नका, अन्यथा आमच्या स्टाइलने धडा शिकवला जाईल, असे त्यांनी सांगितले. तक्रार करा, कारवाई करू ः आगारप्रमुख मडके आगारप्रमुख गजानन मडके यांनी स्मार्ट कार्ड आवश्यक असल्याचे सांगितले. दर १९९ रुपये असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र ३०० रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारीवर ते म्हणाले, लूट होत असेल तर कारवाई करू, यासाठी ज्येष्ठांनी तक्रार करावी. तत्काळ कारवाई केली जाईल. पैठण बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची होत असलेली गर्दी. शकतील. रोख व्यवहार कमी होणार आहे. वेळेची बचत होणार आहे. पैठण तालुक्यात साधारण ७ ते ९ हजार ज्येष्ठ नागरिक एसटीने प्रवास करतात. या सर्वांना कार्ड आवश्यक आहे. तालुक्यात कार्डसाठी एकच केंद्र आहे. येथे दररोज केवळ १०० ज्येष्ठांची नोंद असल्याने अनेकांना परत जावे लागते. प्रत्येक मोठ्या सर्कलमध्ये कार्ड सेंटर सुरू करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक संघटनेने केली आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. वयाचा पुरावा आवश्यक असून आधार किंवा पॅन कार्ड व फोटोही आवश्यक आहे.
गाजगाव येथील काळवणे यांचा जिल्हा बँकेच्या मतदानासाठी ठराव:एकमताने बिनविरोध निवड
प्रतिनिधी | लासुर स्टेशन गाजगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाकडून नुकतेच जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष उत्तमराव काळवणे यांच्या नावाचा एकमताने ठराव देण्यात आला. दरम्यान गाजगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत चेअरमन आणि व्हाईस चेअरमनसह सर्व संचालक मंडळाने संतोषराव काळवणे यांच्या नावाचा जिल्हा बँकेसाठी ठरावाची एकमताने बिनविरोध निवड केली. माजी सरपंच कडुबा हिवाळे, बाजीराव काळवणे, देविदास गवळी, अशोक पाटेकर, सतीष हिवाळे, पोलिस पाटील सुरेश संगेकर, विनायकराव भोसले, फकीरचद ठोंबरे, कौसेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
संविधान हा सुशासनाचा रोड मॅप - प्रा. धनेधर:निधोना येथे विद्यार्थी समुपदेशन कार्यशाळा
प्रतिनिधी | फुलंब्री भारतीय संविधान हे केवळ नियमांचे पुस्तक नसून तो एक जिवंत दस्तऐवज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान हे खऱ्या अर्थाने सुशासनाचा रोड मॅप आहे, असे प्रतिपादन प्रा. किरण धनेधर यांनी केले. निधोना येथील प्रभात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित विद्यार्थी समुपदेशन कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. पठाण एस. एच. हे होते. प्रा. धनेधर पुढे म्हणाले की, भारतीय संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा असून तो लोकशाही, न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या मानवी तत्त्वांवर आधारित आहे. हे संविधान नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करते आणि सरकारची रचना व त्यांच्या मर्यादा स्पष्ट करते. देशातील विविधता जपून एकता व अखंडता राखण्याचे सामर्थ्य संविधानात असून, बदलत्या काळानुसार देशाच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता यात आहे. डॉ. संजय जाधव यांनी प्रास्ताविक केले.
प्रतिनिधी | फर्दापूर जिल्हा परिषद शाळा दत्तावाडी (ता.सोयगाव) येथील शिक्षक दीपक बावस्कर यांना.ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. मान्यवरांच्या उपस्थित पुणे येथील निगडी येथे देण्यात आला आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. पुणे येथील ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने राज्यभरातील शाळांमधे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जितो. फर्दापूर येथील शिक्षक दीपक बावस्कर हे गेल्या अनेक वर्षांपासून जि. प. शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी या काळात सोयगाव तालुक्यातील फर्दापूरतांडा येथे शैक्षणिक क्रांती घडवली आहे. आपल्या सेवाकाळात लोकसहभागातून शाळेच्या भौतिक सुविधांत सुधारणा केली आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत पुणे येथील सामाजिक ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेने त्यांना या वर्षाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला आहे. हा पुरस्कार पुणे येथे दत्तात्रय वारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र दिले.
प्रतिनिधी | पळसवाडी खुलताबाद तालुक्यातील पळसगाव येथे सालाबादाप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह भक्तिभावात पार पडला. आप्पा शास्त्री महाराज पळसवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह झाला. दररोज भजन, हरिनाम, प्रवचन, कीर्तन झाल्याने गावात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. सप्ताहादरम्यान विविध सुप्रसिद्ध महाराजांची कीर्तने झाली. शेवटच्या दिवशी हभप आप्पा शास्त्री महाराज पळसवाडीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. त्यांनी श्रीकृष्णावर आधारित अभंग घेऊन कीर्तनाची सुरुवात केली. हरिनामाचा गजर झाला. कीर्तनात श्रीकृष्णाच्या बाललीला मांडल्या. गोकुळातील खोडकर प्रसंग सांगितले. कंसवधाचा प्रसंग आला. भगवद्गीतेतील जीवनमूल्यांचा ऊहापोह झाला. भक्तिमुळे जीवनाला दिशा मिळते, श्रीकृष्ण नामस्मरणाने संकटे दूर होतात, असा संदेश त्यांनी दिला. उदाहरणांसहित प्रसंग उलगडले. भक्त आणि भगवंत यांचे नाते स्पष्ट केले. टाळ-मृदुंगाच्या गजरात अभंग सादर झाले. वातावरण भारावून गेले होते. सप्ताह यशस्वी होण्यासाठी गावातील कार्यकर्ते, युवक मंडळ, नागरिकांनी नियोजनबद्ध तयारी केली होती. सात दिवस चाललेल्या सप्ताहामुळे गावात भक्तिमय वातावरण राहिले.
सिल्लोडचे ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवाच्या तयारीची पाहणी करताना नगराध्यक्षांसह इतर. प्रतिनिधी | सिल्लोड सिल्लोडचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रा उत्सवाची सुरुवात मंगळवारपासून (दि. ७) होत आहे. या पार्श्वभूमीवर सिल्लोड नगरपरिषदेने तयारीला वेग दिला आहे. नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी संबंधित अधिकारी, उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह यात्रा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला. नगराध्यक्षांनी यात्रा स्थळ, रस्ते, स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, वीजपुरवठा, भाविकांच्या सुरक्षिततेसाठीच्या उपाययोजनांची माहिती घेतली. उत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. कोणतीही गैरसोय होऊ नये, सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. अब्दुल समीर म्हणाले, श्री म्हसोबा महाराज यात्रा हा सिल्लोडचा महत्त्वाचा उत्सव आहे. या काळात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या सोयी-सुविधांची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. स्वच्छता, पाणी, प्रकाश व्यवस्था, वाहतूक नियोजनावर विशेष भर दिला जात आहे. यात्रा परिसरात तात्पुरत्या स्वच्छतागृहांची उभारणी होणार आहे. कचरा व्यवस्थापनासाठी विशेष पथके तैनात राहतील. रस्त्यांची दुरुस्तीचे नियोजन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी नगरपरिषदेचे अग्निशमन दल, इतर यंत्रणा सतर्क ठेवण्यात येणार आहेत. यात्रा उत्सव सुरळीत, उत्साहात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले. पाहणीवेळी उत्सव समितीचे अध्यक्ष सुदर्शन अग्रवाल, विठ्ठल सपकाळ, प्रताप प्रशाद, मनोज झंवर, अशोक बन्सोड, सुधाकर पाटील, सुनील प्रशाद, मंजितराव भाग्यवंत, बाबुराव वाकडे, लखन ठाकूर आदी उपस्थित होते.
संविधान जिवंत दस्तऐवज, सुशासनाचा रोड मॅप - धनेधर:निधोना येथील महाविद्यालयात उपक्रम
प्रतिनिधी | फुलंब्री भारतीय संविधान हे केवळ नियमांचे पुस्तक नाही. तो जिवंत दस्तऐवज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान खऱ्या अर्थाने सुशासनाचा रोड मॅप आहे, असे प्रतिपादन प्रा. किरण धनेधर यांनी केले. तालुक्यातील निधोना येथील प्रभात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाने विद्यार्थी समुपदेशन कार्यशाळा घेतली. प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. धनेधर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पठाण एस. एच. होते. संविधानाचे महत्त्व सांगताना प्रा. धनेधर म्हणाले, भारतीय संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. तो लोकशाही, न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या मानवी तत्त्वांवर आधारलेला आहे. संविधान नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करते. सरकारची रचना स्पष्ट करते. सरकारच्या मर्यादा ठरवते. देशातील विविधता जपत एकता, अखंडता राखण्याचे सामर्थ्य संविधानात आहे. बदलत्या काळानुसार देशाच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता यात आहे. डॉ. संजय जाधव यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. संविधानाच्या अभ्यासाची गरज व्यक्त केली. डॉ. शरद सुखदाणे यांनी आभार मानले. डॉ. शरद सोनवणे, डॉ. वाणी, प्रा. काटकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थ िनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गाजगावमधील सख्ख्या बहिणी एकाचवेळी पोलिस दलात भरती:शेती करून मुलींना शिक्षण दिले
लासूर स्टेशन गाजगाव (ता. गंगापूर) येथील अल्पभूधारक शेतकरी पंढरीनाथ रामनाथ हिवाळे यांच्या दोन मुली साक्षी आणि वैष्णवी हिवाळे यांची छत्रपती संभाजीनगर पोलिस दलात नुकतीच निवड झाली. एकाच वेळी दोघींच्या यशामुळे हिवाळे कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. गावात, परिसरात कौतुक होत आहे. पंढरीनाथ हिवाळे आणि पत्नी कविता पंढरीनाथ हिवाळे यांनी शेती करून मुलींना शिक्षण दिले. साक्षी, वैष्णवी यांचे प्राथमिक शिक्षण गाजगावच्या झेडपी शाळेत झाले. पुढील शिक्षण गावातील श्री गणेश विद्यालयात झाले. त्यानंतर आंबेलोहळ येथील एका अकॅडमीमध्ये पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतले. या प्रवासात शिक्षक केदार प्रधान यांचे मार्गदर्शन मिळाले. आई-वडिलांची खंबीर साथ मिळाली. मुलींना कधी निराश होऊ दिले नाही. हिवाळे कुटुंबात आता पाच जण पोलिस सेवेत आहेत. सपना रुख्मिणी कारभारी हिवाळे आणि जना रुख्मिणी कारभारी हिवाळे या दोन बहिणी दोन वर्षांपूर्वी गावातून पहिल्या महिला पोलिस झाल्या. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन यांनी अभ्यास केला. दोन्ही मुलींचा सार्थ अभिमान ^ सातत्यपूर्ण अभ्यास करून साक्षी, वैष्णवी या दोन्ही मुली छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस भरतीत निवडल्या गेल्या आहेत. मुलींनी अभ्यास व मेहनत केली आहे. मुलींचा अभिमान आहे. -पंढरीनाथ हिवाळे, वडील
वैजापूर | कोल्ही प्रकल्पातून बेकायदेशीर पाणी उपसा सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघड झाल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली आहे. तब्बल ३०० पेक्षा अधिक अवैध मोटारी आणि तलावात बसविलेले बेकायदेशीर वीज डीपी यामुळे धरणातील पाणीसाठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. आधीच केवळ ३८ टक्के उपयुक्त साठा शिल्लक असताना पाच गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जलसमाधी आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आता अवैध उपसा करणाऱ्यांना ३ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला. अवैध पाणी उपसा थांबण्यासाठी सर्व मोटारी ३ दिवसांत काढण्याचे आदेश दिले असून पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता पवन चव्हाण यांनी दिला.
तालुक्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेततळे, विहीर, बोर, नदी, तलावात पाणी वाढले. शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात केली. मुबलक पाणी मिळाले. हिवाळ्यात चांगली थंडी पडली. यंदा गव्हाचे उत्पादन चांगले आले. शेतकऱ्यांना एकरी सरासरी आवकही चांगली मिळाली. मात्र आता मोंढ्यात गव्हाची आवक वाढल्याने दर घसरले आहेत. सध्या धान्य बाजारात गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मोंढ्यात गहू जास्त येत आहे. त्या तुलनेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे. गव्हाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी गहू ३५०० ते ३८०० रुपये दराने विकला जात होता. तोच गहू आता २००० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे. काही शेतकरी गहू फिल्टर करून मोंढ्यात आणत आहेत. त्यांना त्याप्रमाणे भाव मिळत आहे. सध्या मोंढ्यात गव्हाची आवक जवळपास ७०० ते ८०० क्विंटल आहे. गव्हाची आवक वाढल्याने ग्राहक मंदावले आहेत. मालाला उठाव मिळत नाही. त्यामुळे गव्हाचे भाव कमी झाले. ग्राहकांकडून ४९६, अजित १०२, श्रीराम १११ व फिल्टर गव्हाची मागणी जास्त होत आहे. पैठणला गहू फिल्टर करण्याची सुविधा नाही. गहू फिल्टर करण्याकरिता बाहेर जावे लागते. यासाठी खर्च लागत असल्याची माहिती व्यापाऱ्याने दिली. नागरिकांनी धान्य खरेदीकडे पाठ फिरवली आहे. गव्हाचे दर आणखी कमी होतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ग्राहक खरेदीला विलंब करत आहेत. तज्ज्ञांच्या मते सध्याच्या भावात आणखी घट होण्याची शक्यता कमी आहे. शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. मेहनतही जास्त आहे. भाव आणखी कमी झाले तर शेतकरी गहू मोंढ्यात आणणार नाहीत. आवक थांबली तर भाव पुन्हा वाढतील. गव्हाची आवक जास्त असल्याने शहरातील गहू हैदराबाद, सोलापूर येथे पाठवला जात आहे. मोंढ्यात येणाऱ्या ग्राहकांकडून फिल्टर गव्हाची मागणी जास्त आहे. येथे गहू फिल्टर करण्याची एकही मशीन नाही. व्यापाऱ्यांना फिल्टरसाठी छत्रपती संभाजीनगर किंवा शेवगावला जावे लागते. वाहतूक खर्च वाढतो. फिल्टरचा खर्च वाढतो. त्यामुळे व्यापारी गहू हैदराबाद, सोलापूरला पाठवत आहेत.
कंकराळात विहिरीत पिकअप कोसळला:हॅँडब्रेक लावले नसल्याने घटना, जीवितहानी नाही
प्रतिनिधी | सोयगाव उभ्या पिकअपला हॅँडब्रेक लावलेले नसल्याने तो उताराने पुढे जाऊन विहिरीत कोसळल्याची घटना कंकराळा (ता. सोयगाव) स्मशानभूमीजवळ रविवारी दुपारी घडली. सुदैवाने पिकअपमध्ये कुणी नसल्याने जीवितहानी टळली. पाचोरा येथे गव्हाची विक्री करण्यासाठी चालकाने एका शेतकऱ्याचा गहू पिकअपमध्ये भरला होता. दरम्यान, शेतकऱ्याला बोलावण्यासाठी चालक खाली उतरून शेतकऱ्याच्या घरात गेला. या वेळी तो हॅँडब्रेक लावण्याचे विसरला. याच वेळी उताराने पिकअप पुढे जाऊन ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाण्याच्या कठडे नसलेल्या विहिरीत कोसळला. क्रेनच्या मदतीने नंतर वाहन विहिरीतून बाहेर काढले. कंकराळा ग्रामपंचायतीने गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ही विहीर बांधली. शासकीय योजनेतून खर्च झाला होता तरीही विहिरीला कठडे बांधले नाहीत. त्यामुळे ही विहीर अपघाताला निमंत्रण देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरातील खड्ड्यांची समस्या तशी पाचवीलाच पुजलेली. कधी जलवाहिनी तर कधी ड्रेनेजच्या कामासाठी रस्ते खोदले जातात, पण ते बुजवायला कुणालाच वेळ नसतो. याच खड्ड्यांमुळे पाठीच्या कंबरदुखीचा त्रास जडल्याने एका तरुणाला चक्क आपली हक्काची नोकरी गमवावी लागली. मात्र, या संकटाने खचून न जाता, जो त्रास मला झाला, तो इतर कोणाला होऊ नये या जिद्दीने युवराज क्षीरसागर या तरुणाने स्वतःच शहरातील खड्डे बुजवण्याची सकारात्मक मोहीम हाती घेतली आहे. विमा कंपनीत काम करणाऱ्या युवराज यांना सततच्या फिरतीमुळे पाठीच्या गंभीर आजाराने ग्रासले. शेवटी वेदना असह्य झाल्याने त्यांना नोकरी सोडावी लागली. सध्या ते पाण्याचे जार विक्रीचा व्यवसाय करत आहेत. मात्र, व्यवसाय बदलला तरी रस्त्यांची अवस्था बदलली नव्हती. त्यामुळेच त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बंद करण्याचा निर्धार केला. ५ जणांची टीम अन् ५० पेक्षा जास्त खड्डे मुक्त युवराज यांच्या या स्तुत्य उपक्रमात मध्य प्रदेशहून आलेले त्यांचे सहकारी संतोष, राजकुमार, रामकिशन आणि ज्ञानेश्वर हे तरुणही खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. या टीमने आतापर्यंत शहरातील अत्यंत धोकादायक वळणांवरील ५० हून अधिक खड्डे सिमेंट-काँक्रीटने बुजवून हजारो वाहनधारकांचा प्रवास सुखकर केला आहे. विशेष म्हणजे ज्या वळणांवर वाळू किंवा गिट्टी सांडल्यामुळे दुचाकी घसरण्याची भीती असते, ते रस्ते ही मंडळी स्वतःहून झाडून स्वच्छ करतात. मदत नको, फक्त सहकार्य द्या “आम्ही जीव धोक्यात घालून जेव्हा खड्डा बुजवतो तेव्हा अनेकदा लोक त्या ओल्या सिमेंटवरूनच गाड्या दामटतात. यामुळे आमची मेहनत तर वाया जातेच, पण तिथे पुन्हा खड्डा पडतो. नागरिकांनी आमच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी नाही झाले तरी चालेल, पण खड्डा बुजवत असताना गाडी थोडी बाजूने नेली किंवा काही क्षण थांबून सहकार्य केले, तरी ती आमच्या कष्टाची मोठी पावती असेल,’ असे भावनिक आवाहन युवराज क्षीरसागर यांनी केले आहे.
उन्हात करपलेलं माळरान पहिल्याच पावसात मनसोक्त भिजलं आणि हिरव्यागार कुरणांनी झाकून गेलं होतं. पाऊस महिनाभरापूर्वीच थांबला अन् आता थंडीची चाहूल लागली होती. दिवसाही गारवा झोंबत होता. याच गारव्याचा अनुभव घेत मोहटादेवीच्या दर्शनासाठी मयूर कांगणे आणि अशोक ढाकणे मोटारसायकलवर सुसाट निघाले होते. तिसगावजवळ त्यांनी गाडीला ब्रेक लावला. शंभर वर्षांचे वडाचे झाड पाच जण मोठ्या शिताफीने कापत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी झाड तोडण्यास विरोध केला आणि तोडू नका अशी विनंतीही केली; पण कुऱ्हाडी थांबल्या नाहीत. कापणाऱ्यांचे हात थांबत नसतील तर लावणाऱ्यांचे हात वाढवण्याचा संकल्प त्यांनी तिथेच केला. मागील काही वर्षांत त्यांनी ५०० वडाची झाडे लावली आणि ती जगवलीही. माणसांच्या प्रगतीचा साक्षीदार राहिलेला शंभर वर्षांचा वटवृक्ष कापला जात होता. कोणीही पुढे येत नव्हतं, कोणाला काहीच देणंघेणं नव्हतं. कटर, कुऱ्हाड, करवत घेऊन भरदिवसा शंभर वर्षांहून अधिक जुन्या झाडाची हत्या झाली. माणसाला ऑक्सिजन देऊन जगवणारं झाड माणसांनीच कापलं होतं. ज्यांना महत्त्व पटलं त्यांनी वृक्षदानासह साहित्यदान केले ज्यांना महत्त्व पटलं त्यांनी वृक्षदान केले, काहींनी साहित्यदान केले, काहींनी श्रमदान आणि पाणी नियोजनात सहभाग नोंदवला. मागील वर्षी चांदबीबी महाल परिसरात पायथा ते माथा पद्धतीने वडाच्या झाडांची वडराई उभी करण्याचं ठरवलं, तिथं ४९ झाडं लावली. या वडराईला आम्ही सह्याद्री वडराई असे नामकरण केले. नितीन वडमार यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन १४ झाडं दिली. १०० वटवृक्ष लावण्याच्या संकल्पाचा ५०० वृक्षाच्या रूपात अर्धविराम झाला, पण १००० झाडं लावण्याचा प्रवास सुरूच राहील, असा संकल्पही या टीमने केला असल्याचे सांगण्यात आले. ९० टक्के झाडे जगली कोणी ऐकणारं नव्हतं, ही हतबलता स्वस्थ बसू देईना. या वेदनादायी घटनेतून नवा संकल्प प्रसवला. ‘लक्ष्य १००० वटवृक्ष लागवड अन् संगोपनाचं’ ब्रिदवाक्य ठरलं, पण ते प्रत्यक्षात आणायला वेळ द्यावा लागणार होता. त्यासाठी कर्म फाउंडेशनची स्थापना केली. मागील पाच ते दहा वर्षांत लागवड केलेली ९० टक्के झाडं जगली.
गडचिरोलीच्या दाट जंगलात आणि दुर्गम पाड्यांमध्ये मलेरियाशी लढाई आता नव्या पद्धतीने पुजाऱ्यांच्या मदतीने लढली जात आहे. जिथे आजही तापाला ‘देवाचा कोप’ मानले जाते तिथे प्रशासनाने अंधश्रद्धेलाच शस्त्र बनवत आरोग्यसेवेचा नवा पूल उभारला आहे. ‘देव शांत झाला, आता गोळी घ्या’ हे एक वाक्य मलेरियाच्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरले आहे. गडचिरोलीमध्ये तब्बल २७०० पुजारी सध्या कार्यरत आहेत. त्यापैकी जवळपास १२०० पुजाऱ्यांचं समुपदेशन करून त्यांनाच आरोग्य दूत करण्यात आल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुजिता वडीवे यांनी दिली. गडचिरोलीत मलेरिया निर्मूलनासाठी ही ‘लोकाभिमुख आणि वास्तववादी’ रणनीती ठरत आहे. अंधश्रद्धेला नाकारण्याऐवजी तिचाच उपयोग करून आरोग्याचा संदेश पोहोचवण्याचा हा प्रयोग देशासाठीही आदर्श ठरू शकतो, असाही सूर आता निघत आहे. मलेरियाची लक्षणे ओळखण्याचे दिले प्रशिक्षण या पुजाऱ्यांना तापाच्या रुग्णांना मलेरियाची लक्षणे ओळखण्याचे प्राथमिक शिक्षण देण्यात आले आहे. तसेच वेळ न घालवता त्यांना आशा सेविका व दवाखान्यात पाठवण्याची जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यात २७०० पुजाऱ्यांची नोंद आहे. त्यापैकी १२०० जणांचे समुपदेशन पूर्ण केले. जानेवारी २०२६ पासून २७ रुग्ण रेफर, त्यापैकी ४ मलेरिया पॉझिटिव्ह निघाले. रुग्ण पाठवणाऱ्या पुजाऱ्यांना १५ रुपये व मलेरिया निदान झाल्यास ५०० रुपयांची प्रोत्साहन राशी दिली जाते. याचाही मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी दोनदा घरांच्या आतील फवारणी १ एप्रिल २०२५ पासून सरकारने विशेष योजना सुरू केली आहे. सध्या सर्वाधिक डासांचा प्रादुर्भाव असलेल्या दोन तालुक्यात पायलट प्रोजेक्ट सुरू आहे. या दोन तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्यातील घरांत दरवर्षी दोनदा घरांच्या आतील फवारणी केली जाते. त्याचा परिणाम तीन महिनेपर्यत राहातो, असे डाॅ. सुजाता वडीवे यांनी सांगितले. पूर्वी ४-५ दिवस झाडफुकीत घालवणारा रुग्ण आता पुजाऱ्यांच्या सल्ल्याने औषधोपचाराकडे वळत आहे, हा सकारात्मक बदल आहे. आता पुजारी केवळ झाडफुक करणारे नाहीत, तर जीव वाचवणारे ‘फ्रंटलाइन वॉरियर्स’ झाले आहेत. गडचिरोली मलेरियाचा हॉटस्पॉट राज्यातील ५०–६०% मलेरिया रुग्ण एकट्या गडचिरोलीत आढळतात. २०२४ मध्ये तब्बल ६८% रुग्ण होते. २०२५ मध्ये ७,२९३ रुग्णांपैकी १४ मृत्यू झाले. दाट जंगल (७०%), १७०० मिमी पाऊस आणि उघड्यावर झोपण्याची प्रथा हे सर्व घटक धोका वाढवतात. गडचिरोलीमध्ये २०१३ मध्ये मलेरियाचे ६,४३६ रुग्ण आढळले होते. ही संख्या २०१५ मध्ये वाढून ३४,२०६ वर पोहोचली. त्यानंतरच्या वर्षांत रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी २०२१ मध्ये पुन्हा वाढ होऊन १२,३२६ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात हा आजार अजूनही कायम अाहे. पुजारीच झाले ‘आरोग्य दुवा’ गडचिरोलीत सुमारे २७०० पारंपरिक पुजारी कार्यरत आहेत. झाडफूक, मंत्र-तंत्र आणि अघोरी उपचारांवर विश्वास ठेवणाऱ्या आदिवासी समाजासाठी हे पुजारी म्हणजे देवदूतच. आजही जवळपास ४०% लोक आजारासाठी डॉक्टरांऐवजी पुजाऱ्यांकडेच धाव घेतात. हीच बाब ओळखून प्रशासनाने विरोधाऐवजी समावेशक मार्ग निवडला.
आणखी प्रकरण समोर; अब्दुल रशीद ऊर्फ बाबाजानला अटक:खालापूरच्या फार्महाऊसवर भोंदूचा महिलांवर अत्याचार
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या कृत्याने राज्य हादरलेले असतानाच आता नवी मुंबई कळंबाेलीतील अब्दुल रशीद ऊर्फ बाबाजान या भोंदूबाबाचे काळे कारनामे उघड झाले आहेत. या नराधमाने खालापूर येथील फार्महाऊसवर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, दोन धाडसी महिलांच्या तक्रारीनंतर खालापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अब्दुल रशीद हा अत्यंत गोड बोलून लोकांचा विश्वास संपादन करायचा. तो लोकांना आर्थिक, सामाजिक आणि वैवाहिक समस्या दूर करण्याचे आमिष दाखवत असे. समस्या सुटत नसल्यास ‘तुमच्यावर कुणीतरी काळी जादू केली आहे’, असे सांगून तो महिलांना घाबरवायचा. काळी जादू उतरवण्याच्या बहाण्याने हा भोंदूबाबा महिलांना खालापूर येथील एका निर्जन फार्महाऊसवर एकट्याने बोलवायचा. मध्यरात्री अघोरी पूजा करण्याच्या नावाखाली महिलांच्या अंगावरील वस्त्रे काढण्यास त्यांना भाग पाडत असे. विरोध करणाऱ्या महिलांना जादूटोण्याने संपवून टाकण्याची किंवा जिवे मारण्याची धमकी देऊन तो त्यांच्यावर बलात्कार करायचा. दरम्यान, या भोंदूबाबाने अशाच प्रकारे आणखी काही महिलांची फसवणूक किंवा त्यांच्यावर अत्याचार केले असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बदनामीच्या किंवा जादूटोण्याच्या भीतीने गप्प न बसता, अन्य पीडित महिलांनी निर्भयपणे पुढे येऊन पोलिसांत तक्रार दाखल करावी, असे आवाहन खालापूर पोलिसांनी केले आहे. आतापर्यंत दोन महिलांच्या पोलिसांमध्ये तक्रारी पोलिस उपअधीक्षक डॉ. विशाल नेहूल यांनी सांगितले की, पीडित महिलेच्या तक्रारीवरून अब्दुल रशीद ऊर्फ बाबाजान या भोंदूबाबाला अटक केली असून त्याचा अधिक तपास सुरू आहे. केवळ दोन महिलांनी तक्रार केली असली तरी या नराधमाने अनेक पुरुष आणि महिलांची फसवणूक केल्याचा संशय आहे. फार्महाऊसवर महिलांना बोलवायचा कळंबोली येथील सोसायटीत त्याने बस्तान थाटले होते त्याठिकाणी त्याची वाढती गर्दी पाहून रहिवाशांनी त्याला घर सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला होता. त्यामुळे खालापूर येथील निर्जनस्थळी असलेल्या फार्महाऊसवर तो महिलांना बोलावत असत. भोंदूच्या जाळ्यात महिला अडकणे ही चिंतेची बाब खरात प्रकरणानंतरही भोंदूबाबांच्या जाळ्यात महिला अडकणे ही समाजासाठी चिंतेची बाब आहे. अंधश्रद्धा आणि कौटुंबिक संकटांचा फायदा घेऊन हे भोंदू महिलांचे शारीरिक व मानसिक शोषण करतात. शिक्षणाचा प्रसार होऊनही समाज अजूनही अशा छुप्या गुन्हेगारांना ओळखण्यात अपयशी ठरत आहे.
लव्ह जिहाद प्रकरणे राेखण्यासाठी महाराष्ट्रात कायदा आहेच, मात्र अशा प्रकरणांमध्ये घरवापसी केलेल्या मुलींच्या अपत्यांना यापुढे हिंदू कायदा लागू हाेईल, वारसा हक्क कायद्यात त्यासाठी बदल करण्याच्या दिशेने शासन कार्यरत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे रविवारी अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेत दिली. नाशिक येथे ४ व ५ एप्रिल २०२६ रोजी आयोजित अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील सुमारे ३०० संत सहभागी झाले असून त्यास रविवारी फडणवीस यांनी संबाेधित केले. सनातन धर्म जपणे व पुढे नेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आधीच अस्तित्वात आहे. मुस्लिम तरुणाशी विवाह केल्यानंतर जबरदस्तीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाल्यास अशा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. त्यामुळेे अशा प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी शासनाकडे ठाेस कारण असेल. त्यानंतरही घरवापसी झालेल्या व पुन्हा हिंदू धर्मात आलेल्या मुलींच्या अपत्यांना आईचाच धर्म लागू व्हावा, यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. धर्मरक्षण करणाऱ्याला व्यक्तींना शस्त्र परवाना देण्यात येणार का? या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्याची सुरक्षा व्यवस्था सक्षम असून महाराष्ट्र पोलिस रक्षण करण्यासाठी समर्थ आहेत. वारसा कायद्यात बदलाचे हक्क केंद्र सरकारकडे सद्यस्थितीत आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती आहे. हिंदू आणि मुस्लिम अशा दाेन्हीही कायद्यांनुसार वारसा हा पित्याचा असताे. अशा स्थितीत वारसाहक्क कायद्यात बदल करावे लागतील तरच मुलीच्या अपत्यांना मातेचे हक्क प्राप्त हाेऊ शकतील. हे कायदे केंद्र सरकारच्या अखत्यारितील आहेत. त्यात दुरुस्तीचा अधिकारदेखील केंद्रालाच आहे. - अॅड. विलास लाेणारी
तिहेरी हत्याकांडानंतर 24 तासांत नांदेडला पुन्हा खून:जुन्या वादातून तरुणावर केले तलवारीने वार
शहरातील ई-स्क्वेअर डी मार्टपरिसरातशुक्रवारीमध्यरात्री झालेलीतिहेरी खुनाचीघटना ताजीअसतानाचशनिवारी मध्यरात्रीजुना मोंढा भागातील मुरमुरागल्लीत आणखी एकाचा खूनझाला. जुन्या वादातून तलवारीनेवार करत ३५ वर्षीय युवकाची हत्याकरण्यात आली आहे. या प्रकरणातदोन आरोपींना पोलिस निरीक्षकपरमेश्वर कदम व त्यांच्यासहकाऱ्यांनी अटक केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री नांदेड तीनखुनांनी हादरले होते. ई-स्क्वेअरभागात एका तरुणाची चाकूनेसपासप वार करून हत्या करण्यातआली होती. या हल्ल्यात जखमीझालेल्या एकाला विष्णुपुरीशासकीय रुग्णालयात उपचारासाठीनेण्यात आले होते. रुग्णालयातभरती करण्यात येत असतानाहल्लेखोरांनी जखमीची हत्या केलीहोती. ही घटना ताजी असतानाचशनिवारी मध्यरात्री मुरमुरा गल्लीपरिसरात जुन्या वादातूनरणजितसिंग तबेलेवाले उर्फ रज्जा(३५) याच्यावर दोन हल्लेखोरांनीतलवारीने सपासप वार केले. याघटनेनंतर आरोपी पसार झाले होते.वजिराबादचे पोलिस निरीक्षकपरमेश्वर कदम घटनास्थळीपोहोचल्यानंतर त्यांनी जखमीरणजितसिंगला रुग्णालयात दाखलकेले. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यूझाला. घटनेचे वृत्त कळताच पोलिसअधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्तपोलिस अधीक्षक सुरज गुरव,उपविभागीय पोलिस अधिकारी(शहर) रामेश्वर व्यंजने व त्यांचेसहकारी घटनास्थळी पोहोचले.घटनेचा पंचनामा करून अज्ञातव्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यातआला होता. ५ एप्रिल रोजी पहाटेयातील दोन्ही आरोपींना अटककरण्यात आली. दोन मारेकऱ्यांना अटक वजिराबादचे पोलिस निरीक्षकपरमेश्वर कदम यांनी दिलेल्यामाहितीनुसार मुरमुरा गल्लीतरणजितसिंग तबेलेवाले याच्याखुनाच्या प्रकरणात दोन आरोपींनाअटक करण्यात आली आहे.मनप्रितसिंग परविंदरसिंग काचवाले(२३) आणि परमज्योतसिंगपरविंदरसिंग काचवाले (२५, दोघेहीरा. अबचलनगर, नांदेड) अशीअटक करण्यात आलेल्या दोघांचीनावे आहेत. या प्रकरणाचा तपाससहायक पोलिस निरीक्षक उमाकांतपुणे करत आहेत.
लग्नानंतर काही काळातच सासरच्या मंडळींकडून होणारा शारीरिक व मानसिक त्रास, नणंदेचा हस्तक्षेप आणि पतीने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय घर सोडून जाणे या सर्व बाबींची गंभीर दखल घेत छत्रपती संभाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश पलक एन. जमादार यांनी पीडित पत्नीला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने अर्जदार पत्नीला दरमहा १० हजार रुपये पोटगी आणि ५ हजार रुपये कायदेशीर खर्चापोटी देण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे पतीने पाेटगीपासून वाचण्यासाठी साडेसहा लाखांचे कर्ज घेतले हाेते. पतीची चलाखी न्यायालयाच्या लक्षात आली. प्रकरणातील अर्जदार महिलेचा भुसावळ येथील रेल्वे विभागातील कर्मचारी अमित अनिल चौथमल याच्याशी २७ डिसेंबर २०२२ रोजी विवाह झाला. लग्नानंतर अर्जदार भुसावळ येथे सासरी राहण्यास गेल्या, मात्र तेथे त्यांना पतीच्या बहिणींकडून त्रास सुरू झाला. पतीची बहीण मानसिक आजाराने ग्रस्त असून ती अर्जदारास शिवीगाळ करत असे, असा आरोप अर्जदारांनी केला होता. आदेशाला कारणीभूत ठरलेली बाब न्यायालयाने आपल्या निवाड्यात एका महत्त्वाच्या बाबीवर विशेष भर दिला. पतीने पत्नीच्या पाठीमागे भाड्याचे घर रिकामे करणे. अर्जदार राखी पौर्णिमेसाठी माहेरी आल्या होत्या तेव्हा पतीने कोणतीही कल्पना न देता भुसावळ येथील भाड्याचे घर रिकामे केले व तो स्वतःच्या आई-वडिलांकडे राहायला गेला. न्यायालयाच्या मते, ही कृती पतीचा पत्नीसोबत राहण्याचा प्रामाणिक हेतू नसल्याचे दर्शवते. तसेच पतीने दाखल केलेली ‘वैवाहिक हक्क पुनर्स्थापनेची’ याचिकादेखील तो न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे फेटाळण्यात आली होती. त्यावरून त्याचा पत्नीला सांभाळण्याचा हेतू नसल्याचे सिद्ध झाले. अर्जदाराकडून अॅड. रमेश घाेडके पाटील यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाचा निर्णय पतीने देखभाल खर्च देण्यापासून वाचण्यासाठी ६.५० लाख रुपयांचे कर्ज काढल्याचे भासवले होते, परंतु न्यायालयाने ते अमान्य केले. अर्जदार उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने आणि पती रेल्वेमध्ये सरकारी नोकरीत असल्याने न्यायालयाने १६ मार्च २०२४ पासून दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. सध्या अर्जदारांची २३ महिन्यांची पोटगी थकीत आहे. ही थकीत पोटगी (२ लाख ३५ हजार रुपये) वसुलीसाठी अर्जदारांनी पुन्हा न्यायालयात दाद मागितली आहे. दिव्य मराठी विशेष
मेळघाटातील अतिदुर्गम चिलाटी गावातील २४ वर्षीय किशोर लखाजी बेठेकर या विद्यार्थ्याने उच्च शिक्षणासाठी थेट यूकेतील ‘ब्रिस्टल युनिव्हर्सिटी’कडे झेप घेतली आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने त्याला तब्बल ५५ लाख रुपयांची परदेश शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. या निधीच्या बळावर तो यूकेत ‘एमएस्सी (एज्युकेशन)’ हा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे. चिलाटीसारख्या अत्यंत दुर्गम आणि प्राथमिक सुविधांचा अभाव असलेल्या गावातून किशोरचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. पाचवीपासून शिक्षणासाठी गाव सोडलेल्या किशोरने यवतमाळच्या समाजकार्य महाविद्यालयातून पदवी घेतली. पुढे मुंबईतील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ (टीस) मधून त्याने एमए केले. मेळघाट परिसरात शिक्षणाचा अभाव असल्याने समाजासाठी काही करण्याची त्याची जिद्द होती. त्यातूनच त्याला ब्रिस्टल विद्यापीठात शिक्षणाची संधी मिळाली. किशोरची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील तीन एकर शेतीवर पाच भावंडांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. यातून किशोरने मार्ग काढला. सप्टेंबरपासून सुरू होणार शैक्षणिक सत्र ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल’मध्ये एमएस्सी एज्युकेशनचे शैक्षणिक सत्र सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. वर्षभरासाठी किशोर यूकेमध्येच राहणार आहे. त्यासाठीचा व्हिसा व अन्य कागदपत्रांची जुळवाजुळव तो आता करत आहे. राज्य शासनाने त्याला शिष्यवृत्ती मंजूर केल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे आता किशोर लवकरच ‘यूके’ला जाणार आहे. ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ प्रवेशासाठी ठरले महत्त्वाचे ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल’मध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा नाही. मात्र प्रवेशासाठी विद्यार्थ्याला ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ (एसओपी) सादर करावे लागते. ते अतिशय महत्त्वाचे आहे. ‘एसओपी’मध्ये किशोरने सांगितले की, मी ज्या भागातून येतो तो आदिवासी भाग आहे, त्या भागात शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मला मोठे काम करायचे आहे. त्यासाठी संशोधन करणे गरजेचे आहे. आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल’ ही संशोधनासाठी नावाजलेली आहे. म्हणूनच त्या विद्यापीठात मला प्रवेश घ्यायचा आहे. तोच महत्त्वाचा मुद्दा ठरला आणि किशोरचा प्रवेश त्या ठिकाणी झाला.
नागपूरच्या प्रा. दीपश्री पाटील यांनी ८१ स्वरचित बंदिशींचे सलग अडीच तास सादरीकरण करत विक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या यशाची नोंद इंडिया व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. सखेसोबती फाउंडेशन आणि सारस्वत संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संगीत उपक्रमात प्रा. पाटील यांनी सुमारे ३६ विविध रागांमधील ८१ बंदिशी स्वतः रचून त्यांचे सादरीकरण केले. यानिमित्त त्यांच्या ४० विद्यार्थिनींनीही सहभाग घेत अखंड मैफिल रंगवली. गायक, वादक आणि रचनाकार सर्व महिला कलावंतांचा हा सुरेल कलाविष्कार सर्वांना मंत्रमुग्ध करणारा ठरला. यातून महिला सशक्तीकरणाचा प्रभावी संदेश दिला गेला. या विक्रमामुळे सलग सर्वाधिक स्वरचित शास्त्रीय बंदिशी सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला प्राध्यापक ठरल्या आहेत. राग यमनच्या सर्वाधिक बंदिशी रचल्या दुहेरी विक्रम : प्रा. दीपश्री पाटील यांनी यापूर्वी राग यमनमध्ये सर्वाधिक बंदिशी रचण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. हा त्यांचा दुसरा मोठा विक्रम ठरला आहे. या कार्यक्रमाला डॉ. मनोज तत्ववादी, डॉ. निशा कुलकर्णी आणि डॉ. चित्रा मोडक यांची विशेष उपस्थिती लाभली. श्रोत्यांनीही या सुरेल मैफलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कामगारांच्या अर्जित रजेचे दरवर्षी रोखीकरण होणार
मुंबई : प्रतिनिधी कार्यालयीन कर्मचा-यांची अर्जित रजा अनेकदा न वापरताच संपून जाते, अशी एक प्रमुख तक्रार आहे. मात्र, नवीन कामगार संहिता २०२५ ने या महत्त्वपूर्ण समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. या नवीन कायद्यामुळे कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी कर्मचा-यांना त्यांच्या शिल्लक रजेचे पैसे मिळविण्यासाठी नोकरी सोडण्याची, निवृत्त होण्याची किंवा कामावरून काढून टाकण्याची वाट […] The post कामगारांच्या अर्जित रजेचे दरवर्षी रोखीकरण होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बंगळुरू : आयपीएल २०२६ च्या ११ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सचा ४३ धावांनी धुव्वा उडवला. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. टीम डेव्हिडच्या फटकेबाजीच्या जोरावर निर्धारित २० षटकांत २५० धावांचे लक्ष्य चेन्नईसमोर ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि आयुष म्हात्रे यांसारखे प्रमुख […] The post चेन्नईचा सलग तिसरा पराभव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ट्रान्झेक्शन तपासणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती नाशिक : प्रतिनिधी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता ईडीकडूनही चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच अशोक खरातच्या गैरकृत्यात सहभागी झालेल्या कुणालाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशोक खरातचे जे वेगवेगळ््या प्रकारचे ट्रान्झेक्शन आहे ते आम्ही शोधून काढत आहोत, असे ते म्हणाले. अशोक खरातची संपूर्ण […] The post खरातची ईडीमार्फतही चौकशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामतीत कॉंग्रेस उमेदवार मैदानात
पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अखेर काँग्रेसने उमेदवाराची घोषणा केली. काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत. त्यांचे वडील विजयराव मोरे विधान परिषदेचे आमदार होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या बारामती पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काँग्रेसने उमेदवार […] The post बारामतीत कॉंग्रेस उमेदवार मैदानात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दिल्ली हादरविण्याचा टॉय कार कट उधळला
जैशचे दोन दहशतवादी अटकेत नवी दिल्ली : वृत्तसंस्था मुंबई पोलिस आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एक मोठी संयुक्त कारवाई केली. त्यांनी जैश-ए-मोहमद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून मोसाब अहमद ऊर्फ कलाम आणि मोहमद हमद कालरा यांना अटक केली. ते दिल्लीत टॉय कार बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत होते. सुदैवाने कोणतीही घटना घडण्यापूर्वीच त्यांच्या मुसक्या आवळ््यात आल्या. […] The post दिल्ली हादरविण्याचा टॉय कार कट उधळला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पोहण्यासाठी गेले होते तरुण, दोघांची ओळख पटली छ. संभाजीनगर : प्रतिनिधी उन्हाळ््यामुळे सध्या अंगाची लाही लाही होत असून उन्हाळी सुटीत पोहण्यासाठी विहीर, तलाव किंवा नदी पात्रात तरुणाईसह वडीलधारी मंडळीही जात असतात. परंतु धक्कादायक म्हणजे छ. संभाजीनगर शहरालगत असलेल्या हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या ४ तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने परिसरात शोककळा […] The post हर्सूल तलावात बुडून चौघे ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराणने अल्टिमेटम फेटाळला, ट्रम्प यांची मंगळवारी हल्ल्याची धमकी तेहरान : वृत्तसंस्था इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४८ तासांच्या आत होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याचा दिलेला अल्टिमेटम फेटाळला. इराणच्या केंद्रीय लष्करी मुख्यालय, खतम अल-अंबियाचे जनरल अली अब्दुल्लाही अलीआबादी यांनी ट्रम्प यांचा इशारा मूर्खपणाचा असल्याचे म्हटले आणि अल्टिमेटम फेटाळून लावला. दरम्यान, ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही तर […] The post युद्ध आणखी भडकणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कार-दुचाकी अपघातात २ ठार, ५ गंभीर जखमी
जिंतूर-औंढा महामार्गावरील घटना चारठाणा/प्रतिनिधी जिंतूर-औंढा नागनाथ रस्त्यावरील भोगाव मानधानी रस्त्यावर कार व दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू व पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.५) दुपारी १ च्या सुमारास घडली. वसमत येथील दोघे दुचाकीवरून जिंतूरकडे येत होते तर संभाजीनगर येथील कार जिंतूरहून औंढा नागनाथकडे जात होती. दरम्यान, भोगाव मानधानी रस्त्यावर दोन्ही वाहनांचा समोरासमोर […] The post कार-दुचाकी अपघातात २ ठार, ५ गंभीर जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्हा परिषद शाळांना निधी कमी पडू देणार नाही
लातूर : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या शाळेत गोरगरीबांची मुले शिक्षण घेतात. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, त्यामळे जिल्हा परिषद शाळांना निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन लातूर पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शासकीय वसाहत लातूर येथे आयोजित वार्षिक स्रेहसंमेलन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लातूर महानगरपालिकेच्या नगरसेविका […] The post जिल्हा परिषद शाळांना निधी कमी पडू देणार नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्हा मुख्यालयातील ज्युनियर संघ विजेता
लातूर : प्रतिनिधी लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा बँक कर्मचारी संघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आयोजित टर्फ क्रिकेट स्पर्धा रविवारी घेण्यात आल्या. या स्पर्धेत जिल्हा बँकेच्या १६ संघांनी भाग घेतला होता. अंतिम सामन्यात जिल्हा बँकेच्या मुख्यालयातील ज्युनियर संघांनी मुख्यालयातील सिनियर संघाला नमवून शानदार विजय प्राप्त […] The post जिल्हा मुख्यालयातील ज्युनियर संघ विजेता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आज मोफत प्रवेशाच्या लॉटरीची सोडत
लातूर : प्रतिनिधी आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेश मिळावा म्हणून जिल्हयातील स्वंय अर्थसहित, विना अनुदानित अशा २०७ शाळांनी नोंदणी केली होती. या शाळेतील २ हजार ३४३ मोफत प्रवेशाच्या जागेसाठी ६ हजार ६९९ पालकांनी पाल्यांचे प्रवेशासाठी ३१ मार्च अखेर पर्यंत नोंदणी केली. सोमवार दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मोफत प्रवेशाच्या […] The post आज मोफत प्रवेशाच्या लॉटरीची सोडत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देवणी येथे जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
देवणी : प्रतिनिधी पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद लातूर, नगरपंचायत देवणी व श्री ग्रामदैवत महादेव मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने देवणी येथे जिल्हास्तरीय पशुप्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. जिल्हाभरातील पशुपालकांनी मोठा संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनात देवणी गोवंश, लाल कंधारी गोवंश, संकरित गोवंश, उच्च प्रतीच्या शेळ्या, कुक्कुट पक्षी तसेच विविध जातींचे […] The post देवणी येथे जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उदगिरात पोलिसांचे वाहन फोडले; ४७ जणांवर गुन्हा
उदगीर : प्रतिनिधी उदगीरातील मुसानगर परिसरात गैरकायद्याची मंडळी जमवून पोलिसांवर दगडफेक करीत पोलीसांना जखमी केले व शासकीय कामात अडथळा निर्माण करून वाहनाचे अंदाजे १५ हजार रूपयांचे नुकसान केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी आझम अस्लम जहागीरदार, आसिफ शेख लातूरकर, शार्दूल रशीद शेख, आशा ऊर्फ अस्लम शेख, रोशन ताजोदीन शेख/बिलाल मोहीत जहागीरदार, जाकेर जहागीरदार, बाबर शेख, […] The post उदगिरात पोलिसांचे वाहन फोडले; ४७ जणांवर गुन्हा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शेतकरी, ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयासमोर ठिय्या
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी तळेगाव दे. येथील ग्रामस्थ व शेतक-यांनी वारंवार खंडित होणा-या विजेच्या पुरवठ्यामुळे संतप्त होत महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून गावांतील पाणीपुरवठा व शेतीपंपासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा नियमित मिळत नसल्याने गावांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून पिकांचेही मोठे नुकसान होत असल्याची तक्रार शेतक-यांनी यावेळी केली. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून गावांत पाणी […] The post शेतकरी, ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयासमोर ठिय्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रेणापूरसह तालुक्यात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन
रेणापूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवारी दि. ६ एप्रिल रेणापूर शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद कापसे यांनी दिली. महाराष्ट्र कॉग्रेस कमिटीचे प्रवक्ते तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख […] The post रेणापूरसह तालुक्यात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, आता या वादात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'ची (AI) एन्ट्री झाली आहे. अशोक खरातचे कॉल डिटेल्स (CDR) सार्वजनिक केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले आहेत. सीडीआर कसा मिळवला याचे प्रात्यक्षिक मी माझ्या घरी करून दाखवते, उद्या सकाळी चहा प्यायला या, असे खुले निमंत्रण त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले आहे. अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अंजली दमानिया यांनी खरातच्या सीडीआरचा हवाला देत काही नेत्यांची नावे घेतल्याने खळबळ उडाली होती. मात्र, तांत्रिकदृष्ट्या हा डेटा मिळवणे बेकायदेशीर असल्याचे सांगत विरोधकांनी दमानिया यांचा संबंध थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी जोडला होता. नेत्यांना चहाचे निमंत्रण आणि 'एआय'चे प्रात्यक्षिक अंजली दमानिया यांनी खरातचे कॉल डिटेल्स शोधून काढल्यानंतर त्यांच्यावर भाजपशी संबंधित असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी केला होता. या आरोपांना उत्तर देताना दमानिया यांनी ट्वीट करत संजय राऊत, सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांना उद्या सकाळी १० वाजता आपल्या घरी चहासाठी बोलावले आहे. नेमके काय म्हणाल्या दमानिया? अंजली दमानिया यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी CDR दाखवते, तो माझ्याकडे कसा आला ते तुम्ही स्वतः पहा. मी Claude हे AI वापरून त्यावर नंबर कसे शोधले त्याचे प्रात्यक्षिक दाखवते, तो खरा कसा आहे हे मी कसे चेक केले तेही पाहा. इतकेच नाही तर तुम्ही जे जे नंबर सांगाल, ते तुमच्यासमोर शोधून, त्यात इनकमिंग, आऊटगोईंग आणि कॉल समरी कशी येते, ते तुम्ही पाहा. सुषमा अंधारे, संजय राऊत आणि शशिकांत शिंदे यांना आदरपूर्वक आमंत्रण आहे. मात्र, ह्यानंतर, खरात या विषयावर चर्चा करा आणि हो, मी ही माहिती द्यायला पोलिस महासंचालकांकडे वेळ मागितली आहे. ते उद्या भेटेल तर त्यांनाही माहिती देणार आहे, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. सीडीआर संदर्भात काय म्हणाले फडणवीस? दुसरीकडे, खासगी व्यक्तीकडे कॉल डिटेल्स कसे आले, यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली आहे. सीडीआर मिळवण्याचा अधिकार केवळ तपास यंत्रणांनाच असतो. कोणत्याही खासगी व्यक्तीला तो अधिकार नाही. त्यामुळे अंजली दमानिया यांच्याकडे हा डेटा कोठून आला, याची सखोल चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना दमानिया यांनी सांगितले की, त्यांनी या संदर्भात माहिती देण्यासाठी पोलिस महासंचालकांची भेट मागितली आहे. दमानियांच्या उद्याच्या प्रत्याक्षिकाकडे लक्ष दरम्यान, आता उद्या सकाळी अंजली दमानिया यांच्या घरी हे नेते चहासाठी जाणार का आणि 'Claude' एआयच्या माध्यमातून खरंच कॉल डिटेल्स काढता येतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अंजली दमानिया यांच्या दाव्यामुळे तंत्रज्ञान आणि गोपनीयता या विषयावरही नवी चर्चा सुरू झाली आहे.
देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतीने हादरवण्याचा 'जैश-ए-मोहम्मद' (JeM) या दहशतवादी संघटनेचा मोठा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबईतील कुर्ला आणि ठाणे जिल्ह्यातील खडवली परिसरात संयुक्त मोहीम राबवून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे दहशतवादी 'टॉय कार'चा (खेळण्यातील कार) वापर करून भीषण स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होते. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली स्पेशल सेलने रविवारी मध्यरात्री मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात छापेमारी केली. मुंबईतील गजबजलेल्या कुर्ला परिसरातून एकाला, तर ठाणे जिल्ह्यातील खडवली येथून दुसऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी या भागातील सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. अटक करण्यात आलेले संशयित आणि 'जैश' कनेक्शन या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कामरान उर्फ सोनू उर्फ मोझे (मूळ नाव: मोसाब अहमद उर्फ कलाम) आणि बडा इमरान (मूळ नाव: मोहम्मद हमद कालरा) अशी दोघांची नावे आहेत. प्राथमिक चौकशीत हे दोन्ही आरोपी पाकिस्तानस्थित 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या थेट संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या ताब्यातून अनेक संवेदनशील कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. घातपाताची 'टॉय कार' बॉम्ब पद्धत तपासादरम्यान समोर आलेली सर्वात धक्कादायक माहिती म्हणजे स्फोट घडवण्यासाठी वापरण्यात येणारी युक्ती. हे आरोपी खेळण्यातील कारमध्ये (Toy Car) स्फोटके पेरून दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने स्फोट घडवण्याच्या तयारीत होते. सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवण्यासाठी त्यांनी या अनोख्या मार्गाचा अवलंब करण्याचा कट रचला होता. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. ऑनलाइन माध्यमातून माथी भडकवली पोलिसांच्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी 'ऑनलाइन रॅडिकलायझेशन'चे शिकार झाले होते. सोशल मीडिया आणि एनक्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सच्या माध्यमातून त्यांचे ब्रेनवॉशिंग करून त्यांना कट्टरपंथी बनवण्यात आले होते. सीमापार बसलेल्या त्यांच्या हँडलर्सनी त्यांना दिल्लीत घातपात घडवण्याचे आदेश दिले होते. दिल्लीतील संभाव्य मोठा अनर्थ टळला अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेण्यात येत आहे. तिथे त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवली जाईल. या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि त्यांना स्थानिक पातळीवर कोणी मदत केली का, याचा सखोल तपास दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल करणार आहे. वेळेत झालेली ही अटक आणि उधळलेला कट यामुळे दिल्लीतील संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.
राज्यभरात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एका निनावी पत्राने खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रूपाली ठोंबरे यांना बीडमधून पाठवण्यात आलेल्या या पत्रात थेट राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या पत्रामुळे चाकणकर यांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या निनावी पत्रात असा दावा करण्यात आला आहे की, रूपाली चाकणकर यांच्या आशीर्वादाने बीडमधील राष्ट्रवादीच्या एक महिला पदाधिकारी अशोक खरातकडे महिलांना घेऊन जात होत्या. विशेष म्हणजे, या पत्राचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या हेमा पिंपळे यांनी चाकणकर यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. गर्भलिंग निदानाच्या कृत्याला रूपाली चाकणकर यांचे पाठबळ होते, ही गंभीर बाब असल्याचा खळबळजनक आरोप पिंपळे यांनी केला आहे. एसआयटी चौकशीची मागणी हेमा पिंपळे यांनी या पत्राची सत्यता तपासण्याची मागणी केली आहे. बीडमधील अनेक महिला अशोक खरातकडे जात असल्याची चर्चा आधीपासूनच होती, मात्र या पत्रामुळे त्या चर्चांना आता अधिकृत आधार मिळताना दिसत आहे. पोलीस अधीक्षकांनी या पत्राची दखल घेऊन 'सुओमोटो' अंतर्गत हे प्रकरण एसआयटीकडे सोपवावे. तसेच पत्रावरील स्वाक्षरीची तांत्रिक तपासणी करून संबंधित व्यक्तीचा शोध घ्यावा, असे आवाहन पिंपळे यांनी केले आहे. चाकणकरांच्या अडचणीत वाढ? अशोक खरात प्रकरणाचा तपास सध्या एसआयटीमार्फत सुरू असून दररोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. यापूर्वीच एसआयटीने रूपाली चाकणकर यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, त्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायउतार झाल्या आहेत. अशातच आता गर्भलिंग निदानासारख्या संवेदनशील विषयात त्यांचे नाव गोवले गेल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे ही वाचा… भोंदू अशोक खरातच्या बँक खात्यांचे 'त्या' एका तारखेचे गूढ:विशिष्ट तारखेलाच उघडली अनेक खाती; पोलिसांसमोर नवे आव्हान अंधश्रद्धा, हवाला रॅकेट आणि जमीन बळकावल्याच्या आरोपांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एका 'विशिष्ट तारखेच्या' गुंतागुंतीमुळे नवीन रहस्य समोर आले आहे. खरातने वेगवेगळ्या पतसंस्थांमध्ये आपली बँक खाती उघडताना एकाच विशिष्ट तारखेचा वापर केल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून, या तारखेमागे नेमके काय गुपित दडले आहे, यादृष्टीने आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. सविस्तर वाचा…
राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीनंतर करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये तब्बल ७१ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. सुरुवातीला पात्रतेचे निकष शिथिल ठेवल्यामुळे आणि अर्जांची पडताळणी प्रलंबित ठेवल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अपात्र लाभार्थ्यांवर सरकारने गत २० महिन्यांत सुमारे २१,३०० कोटी रुपये खर्च केले. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै २०२४ […] The post लाडक्या झाल्या दोडक्या! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
२४१ उमेदवारांनी दिली चालक पोलिस शिपाई पदाची लेखी परीक्षा
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या चालक पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा म्हणून दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव, लातूर येथे लेखी परीक्षा अत्यंत सुरळीत, शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. सदर परीक्षेसाठी गुणवत्ता यादीतील एकूण २६२ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी […] The post २४१ उमेदवारांनी दिली चालक पोलिस शिपाई पदाची लेखी परीक्षा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मध्यवर्ती बस स्थानकासमोर वाहतूककोंडी
लातूर : प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर वाहतूक कोंडी होत आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच अवैद्य प्रवासी वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात थांबतात. त्यातच ऑटोरिक्षांचाही थांबा आहे. अनाधिकृत वाहनांच्या गर्दीमुळे बसस्थानकांत प्रवेश करणे आणि बसस्थानकातून बाहेर पडणा-या एस. टी. बसेना रस्ताच मिळत नाही. परिणामी बसस्थानकाच्या बाहेर आणि बसस्थानकाच्या आतमध्ये एस. टी. बसेसच्या रांगा लागलेल्या असतात. विशेष म्हणजे बसस्थानकासमोर […] The post मध्यवर्ती बस स्थानकासमोर वाहतूककोंडी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माधव बावगे यांचा मान्यवरांच्या हस्ते नागरी सत्कार
लातूर : प्रतिनिधी बाबा आमटे राष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे यांचा दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांच्या हस्ते हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सोमनाथ […] The post माधव बावगे यांचा मान्यवरांच्या हस्ते नागरी सत्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शहरातील पाण्याच्या कारंज्यांना आली अवकळा
लातूर : प्रतिनिधी शहरात हवेतील धुलीकणाचे प्रमाण अधिक आहे., असे अनेक अहवालांतून समोर आले आहे. धुळीचे प्रदुषण थांबविण्याकरीत लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत लाखो रुपये खर्च करुन शहरातील प्रमुख १० चौकांत पाण्याचे कारंजे सुरु करण्यात आले होते. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर तर पडली होती शिवाय हवेतील धुलीकणाचेही प्रमाण कमी झाले होते. परंतु, केवळ देखभाल […] The post शहरातील पाण्याच्या कारंज्यांना आली अवकळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महसूल विभागाचे अधिकारी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत असताना, रेती तस्करांनी केवळ हुज्जतच घातली नाही, तर अधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना अड्याळ पोलिस स्टेशन अंतर्गत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० ते ११:३० च्या दरम्यान, मंडळ अधिकारी पृथ्वीराज विठ्ठल अहिर (वय ४७ वर्षे) हे त्यांचे सहकारी महसूल सेवक अमित बावणकर यांच्यासह आपल्या खाजगी कारने (एम.एच. ३६ एच. ६६४९) शासकीय कामासाठी गोळेवाडीकडे जात होते. पहेला-पवनी मुख्य रस्त्यावरील नाल्याजवळ त्यांना एक संशयास्पद ट्रक (क्रमांक एम.एच. ४० बी.जी. ५१७५) येताना दिसला. हा ट्रक थांबवून तपासणी केली असता, त्यात विनापरवाना ८ ब्रास रेती अवैधरित्या वाहून नेली जात असल्याचे उघड झाले. कारवाईत अडथळा आणि जीवघेणा हल्ला मंडळ अधिकारी कारवाई करत असतानाच, तिथे एका चारचाकी गाडीने (एम.एच. ०२ ई.ई. ६२८७) ट्रक मालक आणि चालक पोहोचले. त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. इतक्यावरच न थांबता, त्यांनी जबरदस्तीने ट्रक सुरू केला आणि पळवून नेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा अधिकाऱ्यांनी आपल्या कारने ट्रकचा पाठलाग केला, तेव्हा ट्रक चालकाने अत्यंत बेजबाबदारपणे ट्रक मागे घेऊन अधिकाऱ्यांच्या कारला डाव्या बाजूने जोरात धडक दिली. या धडकेत कारचा आरसा आणि डोअर वायझर फुटून मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांत गुन्हा दाखल अखेर आरोपींनी संगनमताने धाक दाखवून आणि अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणून तिथून पळ काढला. याप्रकरणी पृथ्वीराज अहिर यांच्या लेखी तक्रारीवरून अड्याळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. १७०/२०२६, कलम ११८(१), ३५२ भा.न्या.सं. २०२३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मांदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अड्याळ पोलिस करत आहेत.
अमरावती शहरातील कचरा समस्या अजूनही कायम आहे. पूर्वी तीन वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत शहराचा कचरा संकलित करून कंपोस्ट डेपोवर पाठवला जात होता. आता त्या तिन्ही कंपन्यांचे कंत्राट रद्द करून 'कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर' या नव्या कंपनीकडे हे काम सोपवण्यात आले आहे, तरीही शहरातील कचरा व्यवस्थापनाची स्थिती 'जैसे थे'च आहे. 'कोणार्क'ला कंत्राट देताना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम केंद्रीकृत करण्यात आले आहे. शहरातील पाचही झोनच्या स्वच्छतेसाठी ही एकमेव कंपनी जबाबदार आहे. कंत्राटानुसार, कंपनीने जुन्याच यंत्रणेचा वापर करून तीन महिन्यांत स्वतःची 'फुल प्रुफ' यंत्रणा तयार करणे अपेक्षित होते. स्वच्छतेचे कामही टप्प्याटप्प्याने देण्यात आले होते. मात्र, कामाचा पहिला टप्पा सुरू होऊन जवळपास पाच महिने उलटले तरी कंपनीला स्वतःची अपेक्षित यंत्रणा तयार करता आलेली नाही. यामुळे गेल्या महिन्यात झालेली विशेष सभा तसेच त्यापूर्वीची व त्यानंतरची आमसभा याच मुद्द्यावर गाजली. नगरसेवकांनी कंपनीच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सभागृहात प्रभावी असलेल्या एमआयएमच्या नगरसेवकांनी तर हा ठेका रद्द करण्यासाठी आंदोलनही केले. असे असूनही, कामात अद्याप कोणतीही सुधारणा दिसून आलेली नाही. मनपाने जारी केलेल्या ॲपवर दररोज कचरा संदर्भात तक्रारी नोंदवल्या जातात, परंतु परिस्थितीत बदल होताना दिसत नाही. याव्यतिरिक्त, शहरात पथदिव्यांच्या व्यवस्थापनातही त्रुटी आढळत आहेत. विद्युत खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने रात्री अनेक परिसरात पथदिवे बंद ठेवले जातात, तर काही भागांत दिवसाही पथदिवे सुरू असतात. जुन्या अमरावतीसह अनेक नव्या परिसरात रात्री पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त आहेत. विशेषतः वादळी पावसाच्या दिवसांत ही समस्या अधिक गंभीर होते. शहरातील अंतर्गत व काही बाह्य रस्त्यांवर खड्डे आणि चिखल असल्याने, रात्री पथदिवे बंद असल्यामुळे वाहने घसरून किंवा खड्ड्यातून उसळून अपघात होत आहेत. यामुळे मनपा प्रशासनासह महावितरणविरोधात नागरिकांचा रोष वाढत आहे.
अमरावती येथे ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांनी आंबेडकरी तत्त्वज्ञान हे जागतिक चिंतनाचा अविभाज्य भाग बनले असल्याचे प्रतिपादन केले. आताच्या पिढीने हे तत्त्वज्ञान व्यवहारात आणण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. खांडेकर यांच्या गौरवार्थ आंबेडकरी विचार समितीतर्फे दोन दिवसीय साहित्यिक मेजवानीचे (संगीती) आयोजन करण्यात आले होते. या संगीतीचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे प्रसिद्ध लेखक-विचारवंत प्रा. डॉ. महेंद्र भवरे यांच्या हस्ते झाले. यावेळी का.रा. वाल्देकर, इ.मो. नारनवरे, नरेंद्र शेलार, बबन चहांदे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटक प्रा. डॉ. भवरे यांनी आंबेडकरी चळवळ अत्यंत व्यापक असल्याचे नमूद केले. अशा चळवळीतील कार्यकर्त्यांच्या कार्याचे दस्तऐवजीकरण करणे महत्त्वाचे असून, ते नवीन पिढीला प्रेरणा देईल, असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात ताराचंद्र खांडेकर यांनी समकालीन प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली. आंबेडकरी विचार हा सर्वकालिक कल्याणकारी असून, त्यातून नवीन समाज घडविण्याची प्रक्रिया सुरू होते, असे त्यांनी सांगितले. प्रमुख अतिथींनीही फुले-आंबेडकरांच्या विचारातून देशाचा उत्कर्ष साधता येईल, असे मत मांडले. या दोन दिवसीय कार्यक्रमांतर्गत आंबेडकरी गझल जागर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. इ.मो. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात नंदकुमार दामोदरे, सुदाम सोनुले, संजय घरडे, रोशन गजभिये, देवीलाल रौराळे, अतुल ढोणे, अनिल अघम आणि विनोद बागडे यांनी आपल्या गझल सादर केल्या. स्नेहल सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले, तर कुंदा सोनुले यांनी आभार मानले. दुसऱ्या दिवसाची सुरुवात कवी संमेलनाने झाली. गोविंद वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात बबन चहांदे, मोरेश्वर सहारे, नारायण थोरात, गौतम ढोके, गणेश लांडगे आणि संजय मोखडे यांनी आपल्या रचना सादर केल्या. त्यानंतर 'खांडेकरांचे साहित्य, संस्कृती व चिंतन' या विषयावर परिसंवाद पार पडला. या परिसंवादात प्रा. सुखदेव ढाणके आणि नरेंद्र शेलार यांनी आंबेडकरवादी अर्थशास्त्रीय व श्रमिक कल्याण विषयक विचारांचा परामर्श घेतला. प्रा. डॉ. गजानन बनसोड यांनी परिसंवादाचे संचालन केले, तर सुदाम सोनुले यांनी आभार प्रदर्शन केले.
मोर्शी येथे पंचायत समिती कार्यालय आणि श्री शिवाजी उच्च माध्यमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील शिक्षकांसाठी 'शिक्षण परिवर्तन यात्रा' अंतर्गत एका प्रेरणादायी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी उच्च माध्यमिक शाळेच्या रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोर्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम, गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे, शाळा निरीक्षक मधुकरराव रोडे, मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गायकवाड, संदीप बोबडे, विनोद गाडे, मुरलीधरराव डहाणे, शाळा तपासणी अधिकारी निळकंठ यावले, पर्यवेक्षक विठ्ठल नवरे आणि गजानन चौधरी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दत्तात्रय वारे यांनी जालंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेने आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी प्रगती केली आणि जगातील दहा शाळांमध्ये स्थान कसे मिळवले, तसेच त्यासाठी कोणते बदल केले, याबद्दल शिक्षकांना माहिती दिली. वारे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात बाबळेवाडी आणि जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळांचा कायापालट करून त्यांना जागतिक दर्जाच्या शाळा बनवले आहे. त्यांच्या मते, जोपर्यंत पालकांचा सहभाग घेतला जात नाही, तोपर्यंत शाळांमध्ये अपेक्षित परिवर्तन घडवून आणणे शक्य होत नाही. या कार्यशाळेत 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल शिवाजी उच्च माध्यमिक शाळेचा गौरव करण्यात आला. तसेच, तालुक्यात खाजगी शाळांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या शाळांचा आणि जिल्हा परिषद अंतर्गत प्रथम तीन क्रमांक प्राप्त शाळांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रेमा नवरे यांनी केले, तर ज्ञानेश्वर गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. मोर्शी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत सर्व केंद्रप्रमुख, सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक-शिक्षिका या कार्यक्रमाला उपस्थित होते.
अंबाडा, घाटलाडकीमध्ये गॅस टंचाई:महिन्याभरापासून सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक त्रस्त
मोर्शी तालुक्यातील अंबाडा आणि घाटलाडकी परिसरात गेल्या महिनाभरापासून गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. देशभरात सुरू असलेल्या सिलेंडरच्या टंचाईचा फटका आता ग्रामीण भागालाही बसला असून, यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. भारत गॅस एजन्सीकडून पूर्वी घाटलाडकी परिसरात मोठ्या प्रमाणात सिलेंडरचे वितरण केले जात होते. मात्र, गेल्या महिन्यापासून गॅसच्या गाड्या ग्रामीण भागात येत नाहीत. यामुळे नागरिकांना सिलेंडर मिळवण्यासाठी तब्बल ६० किलोमीटर अंतर कापून जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. एचपी गॅसच्या ग्राहकांनाही तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सिलेंडर मिळवावे लागते. दिवसभर मजुरी सोडून गॅसच्या रांगेत उभे राहावे लागत असल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. वेळेवर सिलेंडर न मिळाल्याने मानसिक त्रास वाढत असून, वेळ आणि पैशांचा अपव्यय होत आहे. विशेषतः ग्रामीण महिलांना याचा मोठा फटका बसत आहे. शहरी महिलांच्या तुलनेत ग्रामीण महिलांसोबत दुजाभाव होत असल्याचा आरोप 'स्त्री शक्ती'ने केला आहे. नागरिकांनी प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत महिलांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, या उद्देशाने गॅस कनेक्शन देण्यात आले होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत सिलेंडर मिळत नसल्याने याच महिलांवर पुन्हा चुलीचा वापर करण्याची वेळ आली आहे. अनेक महिलांनी सरपण गोळा करण्यास सुरुवात केली असून, चुली पेटवल्या जात आहेत. सध्याच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने दोन सिलेंडरमधील कालावधी वाढवला आहे. शहरी भागासाठी हा कालावधी २५ दिवस, तर ग्रामीण भागासाठी ४५ दिवस करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील कुटुंबांमध्ये सदस्यांची संख्या शहरांच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही नियमित गॅस पुरवठा व्हावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

27 C