SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

27    C
...

शनिशिंगणापुरातील ग्रामस्थांचा विजय; अटी-शर्तींसह गावकरी गेट' अखेर खुले!:पहाटे ४ ते रात्री १० पर्यंत मिळणार प्रवेश, ओळखपत्र अनिवार्य‎

प्रतिनिधी | सोनई श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला 'गावकरी गेट'चा प्रश्न अखेर सुटला आहे. देवस्थानचे प्रशासक तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या गेटवरून ग्रामस्थांना प्रवेश देण्यास हिरवा कंदील दाखवला. या निर्णयाचे संपूर्ण परिसरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. आता गावकऱ्यांना पहाटे ४ ते सायंकाळी १० वाजेपर्यंत या गेटचा वापर करता येणार आहे. यापूर्वी देवस्थान विश्वस्त मंडळाकडून पहाटे ४ ते सकाळी ९ आणि सायंकाळच्या आरतीवेळी एक तास इतक्याच वेळेसाठी गेट खुले ठेवले जात होते. मात्र देवस्थानचा कारभार विभागीय आयुक्तांकडे गेल्यानंतर हे गेट पूर्णतः बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामस्थांत नाराजी होती. गावकरी गेट खुले करण्यासाठी शनिशिंगणापूरचे माजी सरपंच बाळासाहेब बानकर यांच्यासह ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता. अखेर प्रशासक डॉ. गेडाम आणि देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत सुरक्षा अधिकारी गोरख दरंदले यांना परवानगीचे पत्र दिले. या निर्णयानुसार, मंदिरात दर्शन सुरू असताना मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूस महाद्वाराजवळील गावकरी गेट खुले ठेवले जाणार आहे. प्रवेशासाठी आधार कार्डद्वारे ओळख पटवून फक्त शनिशिंगणापूर येथील रहिवाशांनाच प्रवेश दिला जाणार असून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच दर्शन बंद होताच गेट बंद करून तेथे सुरक्षा तैनात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गावकरी गेट खुले झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आहेत. असा असेल प्रवेशाचा 'नियम' गावकरी गेट खुले झाले असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने काही नियम लागू केले आहेत: .वेळ : पहाटे ४ ते रात्री १० वाजेपर्यंत. .ओळखपत्र: प्रवेशासाठी 'आधार कार्ड' दाखवणे अनिवार्य असून, फक्त शनिशिंगणापूरच्या रहिवाशांनाच प्रवेश मिळेल. .सुरक्षा : दर्शन बंद होताच गेट बंद केले जाईल, तिथे २४ तास सुरक्षा तैनात असेल.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 9:29 am

बाजरीचा 'उन्हाळी' तडका; शेतकऱ्यांनी मोडला जुना पायंडा!:राहुरीतील शेतकऱ्यांचा प्रयोग, कमी पाण्यात उत्पादनाची आशा, गेल्या वर्षी गव्हापेक्षा बाजरीला मिळाला चांगला भाव‎

प्रतिनिधी |राहुरी गेल्या अनेक वर्षांपासून ठराविक पिकांच्या चक्रात अडकलेल्या राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता नवा 'पॅटर्न' स्वीकारला आहे. रब्बी पिकांच्या तुलनेत जास्त भाव मिळणाऱ्या इतर पिकांना पसंती देत उन्हाळी वातावरणात तयार होणाऱ्या पिकांना शेतीत वाव देऊन शेतीमध्ये उन्हाळी बाजरी' पेरण्याला पसंती दिली आहे. दरवर्षी शेतकरी रब्बीच्या हंगामात गहू, हरबरा, कांदा, आदी पिकांची पेरणी लागवड करतात. मात्र गेल्या वर्षी पासून नोव्हेंबर चा शेवटी उन्हाळी बाजरी या पर्यायी पिकांना शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. शेतात बाजरीचा पेरा केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रात ही पेरणी केली त्यामुळे रब्बी पिकांना पर्याय म्हणून बाजरीचे पीक सध्या पुढे येत आहेत. तशी या अगोदर शेतकरी बाजरीची पेरणी खरीप हंगामात करत असत. मात्र आता रब्बीच्या हंगामात बाजरीची पेरणी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत बाजरीला चांगला भाव मिळत असल्याने शेतीचे आर्थिक नियोजन साधण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. सध्या चांगल्या गव्ह्यास प्रतिक्विंटल २००० ते २२०० भाव व्यापारी देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. बाजरी ला मागील वर्षी ३००० ते ३२०० भाव प्रतिक्विंटल मिळाला होता. मागील वर्षी मिळालेला भाव गहू पिकापेक्षा चांगला असल्याने शेतकरी आता बाजरीचे पिकांची पेरणी करत आहे त्याच प्रमाणे गहू उत्पादन खर्च जादा तर बाजरी उत्पादन खर्च कमी असल्याने बाजरी कमी खर्चात चांगले उत्पादन होत असल्याचे शेतकरी सांगतात. एकूणच आर्थिक गणित साधण्यासाठी शेतकरी रब्बीच्या बाजरीचा पर्याय तयार झाला असल्याने शेतकरी आता याच पिकांना भविष्यात पर्याय म्हणून पाहत आहेत. उन्हाळ्यात कडाक्याच्या उन्हामुळे कडधान्य किंवा इतर नगदी पिके घेताना पाण्याची अडचण येते. अशावेळी कमी पाण्यात आणि कमी कालावधीत येणारे पीक म्हणून बाजरीकडे पाहिले जाते. विशेषतः बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांनी ऊस किंवा इतर पिकांच्या फेरपालटासाठी बाजरीची निवड केली आहे. बाजरीचे पीक केवळ ९० ते १०० दिवसांत हाती येत असल्याने शेतकऱ्यांचा कल बाजरी पेरणीकडे वाढला आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 9:28 am

शिबिरासारख्या उपक्रमांमधून गरजूंना मिळतो आधार:उपमहापौर धनंजय जाधव

प्रतिनिधी|अहिल्यानगर शहरातील आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे स्व. कन्हैयालालजी व स्व. मानकवरबाई कांकरिया यांच्या स्मरणार्थ डॉ. प्रकाश कांकरिया व डॉ. सुधा कांकरिया यांच्यावतीने आयोजित ‘दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया विना टाका’ या शिबिराचे उद्घाटन उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी संतोष बोथरा, डॉ. वसंत कटारिया, मानकचंद कटारिया, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, डॉ. आशिष भंडारी उपस्थित होते. जाधव म्हणाले, गेल्या ३५ वर्षांपासून या हॉस्पिटलने अखंडितपणे रुग्णसेवा केली असून, लाखो रुग्णांना नवजीवन दिले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कमी खर्चात आणि उच्च दर्जाची सेवा देण्याचा प्रयत्न येथे होत आहे. अशा उपक्रमांमुळे समाजातील गरजू घटकांना मोठा आधार मिळत असून, भविष्यातही अशा सेवा अधिक विस्तारल्या जाव्यात, अशी अपेक्षा आहे. संतोष बोथरा व डॉ. वसंत कटारिया यांनी सांगितले की, या शिबिराला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत ४ हजार ७४७ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला असून असंख्य रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. डॉ. महेश घुगे यांनी या शिबिराविषयी माहिती दिली. या शिबिरामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांवर विना टाका शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिरामध्ये २१० रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच महिनाभर सुरू असलेल्या या शिबिराच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागांतून आलेल्या रुग्णांनी सेवांचा लाभ घेतला.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 9:14 am

आर्थिक नियोजन ही आजच्या काळाची गरज:आदित्य चांदेकर

प्रतिनिधी|अहिल्यानगर अन्न, वस्त्र, निवारा या जशा मनुष्याच्या मूलभूत गरजा आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक नियोजन ही सुद्धा काळाची मूलभूत गरज आहे. भविष्याची वाटचाल चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आज प्रत्येकाने पैशाचे नियोजन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी खर्चाचे तसेच वेळेचे नियोजन असणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन आर्थिक सल्लागार व ग्राहक पंचायतीचे सदस्य आदित्य चांदेकर यांनी केले. सावेडी जेष्ठ नागरिक मंच आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अर्थसंकल्प समजून घेताना आणि मृत्युपत्राची गरज या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ग्राहक पंचायत संस्थेचे अध्यक्ष गजेंद्र क्षीरसागर, कोषप्रमुख कृष्णराव बागडे, राजेंद्र कळमकर, ॲड. सिद्धार्थ वाघमारे, पंचायतचे उपाध्यक्ष दत्तात्रय सोनार, ज्योती केसकर, एस. आर. जोशी, बलभीम पांडव आदी उपस्थित होते. प्रत्येकाचे आज बँकेमधील खाते हे जॉईंट स्वरूपाचे असावे. आपल्या इच्छेने मृत्युपत्र सर्वांनी रजिस्टर पद्धतीने तयार करून ठेवावे. तसेच पेन्शनर लोकांनी आपल्या नातवंडांच्या शिक्षणासाठी पैसे योग्य तेथे गुंतवावे. राष्ट्रीयकृत बँकेत आपला आर्थिक व्यवहार असावा व त्यामध्येच आपल्या डिपॉझिट खाते असावे असेही चांदेकर यांनी सांगितले. अध्यक्ष गजेंद्र क्षीरसागर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. मंचच्यावतीने आदित्य चांदेकर व गजेंद्र क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शलाका रसाळ यांनी केले. तर आभार पुष्पा चितांबर यांनी मानले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 9:13 am

मन शांत ठेवण्यासाठी भगवंताचे नामस्मरण हाच खरा पर्याय - तांबे:हरिनामाच्या गजरात दुमदुमला परिसर, संत विचारांतून समाजप्रबोधन

प्रतिनिधी|अहिल्यानगर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी व अभंगांच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार केला. देवाचे नामचिंतन हे स्वतःपुरते मर्यादित न ठेवता इतरांपर्यंत पोहोचवावे, कारण नामस्मरणामुळे इतरांचाही उद्धार होतो. कलियुगात हरिनाम हेच उद्धाराचे सर्वोत्तम साधन असून प्रत्येकाने नामस्मरण करणे गरजेचे आहे. मन शांत ठेवण्यासाठी देवाच्या नामचिंतनाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे प्रतिपादन हभप पवन महाराज तांबे यांनी केले. नालेगाव येथील गाडगीळ पटांगण येथे श्री हनुमान जयंतीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात हभप पवन महाराज तांबे यांनी कीर्तनातून भाविकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रभावी कीर्तनातून संत विचार, नामस्मरण आणि अध्यात्मिक जीवनाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थिताना मार्गदर्शन करण्यात आले. नामचिंतनामुळे मनामध्ये एकाग्रता निर्माण होते आणि हीच एकाग्रता यशाचे बीज ठरते. भक्ती आपल्या जीवनात नसेल तर जीवन निरर्थक ठरते. आपणही देवाच्या नावाचे श्रवण करून आपल्या जीवनात शांती आणि समाधान मिळवले पाहिजे. मन शांत ठेवण्यासाठी देवाच्या नामचिंतनाशिवाय दुसरा पर्याय नाही. संतांनी दिलेले विचार समाजात रुजवले तर समाज सुसंस्कृत व अध्यात्मिक बनेल आणि पुढील पिढी घडेल, असा विश्वास पवन महाराज तांबे यांनी यावेळी व्यक्त केला. माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांच्या पुढाकारातून गेल्या ३४ वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असून यावर्षीही हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. गाडगीळ पटांगण परिसरात धार्मिकतेचा उत्सव रंगला असून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेत आहेत. या धार्मिक सोहळ्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. या सोहळ्यामुळे परिसरात नवचैतन्य निर्माण झाले आहे. या सोहळ्यात काल बालकीर्तनकार हभप कृष्णाई महाराज महामुनी यांचे कीर्तन झाले. लहान वयातही प्रभावी शैलीत सादर केलेल्या कीर्तनातून कृष्णाई महाराज यांनी संत विचार, संस्कार आणि समाज यांचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांची मने जिंकली. कीर्तनात त्या म्हणाल्या की, संत हे ब्रह्मरूप स्थितीत असतात आणि त्यांच्या विचारांचे संस्कार लहानपणापासून मुलांवर होणे अत्यंत गरजेचे आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 9:12 am

अडकलेल्या बिबट्याला वाचवण्यासाठी जोडीदाराने १५ फूट ओढला पिंजरा..!:परिसरात बिबट्यांची मोठी 'टोळी' सक्रिय असल्याचे स्पष्ट

प्रतिनिधी| पारनेर गेल्या आठवड्यात शनिवारी व रविवारी बहिरोबावाडी (किन्ही, पारनेर ) येथील महादेव मंदिर परिसरात दोन बिबट्यांचा वावर आढळल्याने वनविभागाने त्या ठिकाणी पिंजरा उभारला. वनविभागाने रविवारी (२९ मार्च) दुपारी लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी (३० मार्च) पहाटे पाचवा बिबट्या जेरबंद झाला आहे. मात्र, या घटनेत एक धक्कादायक बाब समोर आली आहे; पिंजऱ्यात अडकलेल्या आपल्या साथीदाराला सोडवण्यासाठी बाहेर असलेल्या बिबट्यांनी चक्क पिंजरा १५ फूट ओढून नेला. या प्रकारामुळे परिसरात बिबट्यांची मोठी 'टोळी' सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले. असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, किन्ही परिसरात अद्याप चार ते पाच बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. किन्ही उर्वरित पान ४ दुसरा मोकाट असल्याने भीती दोन बिबट्यांपैकी एक जेरबंद करण्यात यश आले असले,तरी दुसरा मोकाट असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. दुसरा बिबट्या पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याची जोडीदारीण (मादी) असण्याची शक्यता आहे.पाळीव प्राण्यांवरील हल्लेही अधूनमधून सुरू असल्याने ग्रामस्थ चिंतीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 9:10 am

चांदवडला गुरुवारपासून रेणुका देवीचा चैत्रोत्सव; अभिषेक, पालखी मिरवणूक:विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; ९ दिवस सुरू राहणार यात्राेत्सव‎

प्रतिनिधी | चांदवड उत्तर महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चांदवड निवासिनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी श्री रेणुका मातेच्या चैत्र पौर्णिमेनिमित्त आयोजित चैत्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, मंदिर परिसर व ट्रस्ट प्रशासन यात्रोत्सवासाठी सज्ज झाले आहे. चैत्रोत्सवानिमित्त गुरुवारी (दि. २) श्री रेणुका देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक एम. के. पवार व सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली. श्री रेणुका देवी मंदिरात नवरात्रोत्सवात ९ दिवस तर चैत्र पौर्णिमेला एक दिवसीय यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यानिमित्त बुधवारी रात्री १२ वाजता मंदिरावर ध्वजारोहण करुन उत्सवास प्रारंभ होईल. चैत्रोत्सवात गुरुवारी पहाटे ४ वाजता नितीन चांदवडकर (नाशिक), नाना सानप यांच्या हस्ते सपत्नीक महाअभिषेक व पूजन तसेच हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. देवीचा गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार असून, रेणुका देवीला पैठणी परिधान करुन आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता रंगमहालापासून रेणुका देवीची आभुषणे सवाद्य पालखी मिरवणूकीने रेणुका देवी मंदिरात नेण्यात येऊन ती विधीवत देवीच्या मूर्तीवर चढविण्यात येणार आहेत. यात्रोत्सवानिमित्त भजन, पूजन, महाआरती आदी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तर गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. यानिमित्त नाशिकचे नितीन चांदवडकर, नाना सानप यांच्यावतीने भाविकांना प्रसाद वाटप तसेच मोनू अग्रवाल, पप्पू भालेराव यांच्यावतीने मठ्ठा वाटप तर श्री महावीर जैन सेवा केंद्राच्या वतीने भाविकांसाठी थंड व शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर सुशोभीत करण्यात आला असून, आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. मंदिरावर व कळसावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उन्हापासून भाविकांचे संरक्षण व्हावे यासाठी मंदिर आवारात मोठा मंडप देण्यात येणार आहे. अनेक भाविक येथे नवस फेडण्यासाठी येतात व प्रत्येक पायरीवर नारळ फोडण्याचा नवस करतात. त्यासाठी संस्थानकडून नारळ फोडण्याचे मशीन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पुरातत्व खात्यामार्फत मंदिर परिसरात विविध विकासकामे सुरु असून, यात्रास्थळ विकास निधीतून भक्तनिवास, सभागृह, स्त्रीयांसाठी प्रसाधनगृह, भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी शिर्डीच्या धर्तीवर बॅरेकेटींगची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील दोन्ही दीपमाळा पुरातन रुपातच नव्याने बनविण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात भाविकांना पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यात्रोत्सवासाठी मंदिर परिसरात मिठाई, खेळणी, नारळ, प्रसाद, फुले यांची दुकाने थाटली जाणार आहेत. यात्रोत्सव यशस्वीतेसाठी व्यवस्थापक एम. के. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार, विलास पवार, पुजारी विजय जोशी, हरेंद्र वैद्य, अमोल कुलकर्णी, नारायण कुमावत, खंडू आहेर, हरिभाऊ कासव, खंडू आहेर आदींसह रेणुका देवी सेवा मंडळ, चंद्रेश्वर भक्त मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. यात्रोत्सव कालावधीत पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. भाविकांना सुलभ दर्शनासाठी वाढवली गाभाऱ्याची उंची भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी गाभाऱ्याची उंची वाढविण्यात आली असून, पाच वर्षांपूर्वी देवीच्या मूर्तीला वज्रलेप करण्यात आल्याने भाविकांना मनमोहक रुपातील रेणुका मातेचे दर्शन घेता येणार आहे. मंदिरातील संपूर्ण गाभारा चांदीचा करण्यात आला आहे. भाविकांना मंदिराकडे येण्याजाण्यासाठी दोन स्वतंत्र मार्गाचे काम करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 8:20 am

लासूर बाजारातील व्यापाऱ्यांसह नागरिकांना सुविधा देऊ- सभापती:कविता चव्हाणांनी भाजीपाला खरेदी करताना साधला नागरिकांशी संवाद‎

प्रतिनिधी | लासूर स्टेशन गंगापूर पंचायत समितीच्या सभापती कविता चव्हाण, पती रवींद्र चव्हाण हे रविवारी (२९ मार्च) लासूर स्टेशनच्या आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करताना दिसले. त्यांनी स्थानिक दुकानदारांशी संवाद साधला. भाजीपाला खरेदी केली. सभापती बाजारात खरेदी करताना दिसल्याने नागरिक, शेतकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. या वेळी चव्हाण यांनी बाजारकरूंना योग्य त्या सुविधा देऊ, असे आश्वासन दिले. कविता चव्हाण म्हणाल्या, सभापती झाल्यानंतरही बाजारात भाजीपाला खरेदी करणे आमच्यासाठी वेगळे नाही. लासूर स्टेशनच्या आठवडी बाजारात दर रविवारी मी किंवा माझे पती भाजीपाला खरेदीसाठी येतो. हे बाजारातील भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना, नागरिकांना माहीत आहे. आम्ही शेतकरी आहोत. कितीही मोठ्या पदावर गेलो तरी सामान्य जीवन सोडणार नाही. शेतकरी, सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणे हा आमचा स्थायीभाव आहे. तो कायम टिकवू. कविता चव्हाण, रवींद्र चव्हाण यांनी बाजारात शेतकरी, व्यापाऱ्यांशी अडचणींबाबत चर्चा केली. शेतकरी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पंचायत समितीमार्फत जे शक्य आहे ते केले जाईल, असे त्यांनी सांगितले. आठवडी बाजारात चोरीच्या घटना घडतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणेला सजग राहण्याबाबत सूचना केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे आदेश देणार लासूर स्टेशनच्या आठवडी बाजारात आसपासच्या ५० गावांतील शेतकरी भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी येतात. नागरिकही येतात. त्यांच्यासाठी बाजारात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले जातील, असे सभापती कविता चव्हाण यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 7:56 am

महाराणा क्रिकेट टीम चांडोळचा विजय‎:पळशीतील क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासह ५१ हजारांचे बक्षीस पटकावले‎

प्रतिनिधी | पळशी येथे झालेल्या ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना चुरशीचा ठरला. बुलढाणा जिल्ह्यातील महाराणा क्रिकेट टीम चांडोळने लिहा जागीर क्रिकेट टीम लिहावर अवघ्या २ धावांनी विजय मिळवला. महाराणा टीमने ५१ हजार रुपये रोख पारितोषिक, ट्रॉफी जिंकली. स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते. अंतिम सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ केला. मैदानावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली. जल्लोष झाला. अंतिम सामना, बक्षीस वितरणासाठी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघांचा सन्मान झाला. प्रथम पारितोषिक पंचायत समिती सदस्य सतीश ताठे यांच्या तर्फे ५१ हजार रुपये ठेवण्यात आले होते. द्वितीय पारितोषिक जि.प. सदस्य केशव पाटील तायडे यांच्यातर्फे ३१ हजार रुपये ठेवण्यात आले होते. तृतीय पारितोषिक गोपालसिंग राजपूत यांच्यातर्फे ११ हजार रुपये ठेवण्यात आले होते. चतुर्थ पारितोषिक दीपक बडक यांच्यातर्फे ११ हजार रुपये ठेवण्यात आले होते. बक्षीस वितरणावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अर्जुन पाटील गाडे, जि.प. सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक केशव पाटील तायडे, बाजार समिती संचालक सतीश ताठे, जि.प. सदस्य राजू काळे, माजी चेअरमन दत्तू पाटील बडक, माजी सरपंच भाऊसाहेब पाटील बडक उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 7:55 am

वैष्णवी सोनवणे हिची रेल्वे पोलिस दलामध्ये निवड:मेहनत, जिद्द, खेळातील कामगिरीच्या जोरावर मिळवले यश

प्रतिनिधी | बोर दहेगाव नालेगाव येथील भागीरथी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी बाळू सोनवणे हिची महाराष्ट्र पोलिस लोहमार्ग (छत्रपती संभाजीनगर) येथे निवड झाली. मेहनत, जिद्द, खेळातील कामगिरीच्या जोरावर तिने हे यश मिळवले. वैष्णवी लहानपणापासून खेळात सक्रिय आहे. तिने विविध क्रीडा स्पर्धांत यश मिळवले. शालेय जीवनात जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धांत भाग घेत अनेक पदके पटकावली. राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिने महाराष्ट्रातून तृतीय क्रमांक मिळवला. या कामगिरीमुळे तिची शारीरिक क्षमता वाढली. आत्मविश्वास वाढला. त्याचा फायदा पोलिस भरती प्रक्रियेत झाला. कठोर शारीरिक चाचण्या दिल्या. लेखी परीक्षेतही उत्कृष्ट कामगिरी केली. अंतिम निवड मिळवली. या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण आहे. परिसरातही उत्साह आहे. इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे. या यशाबद्दल नालेगावमध्ये गावकऱ्यांनी तिची मिरवणूक काढली. भागीरथी माध्यमिक विद्यालय (नालेगाव), इन्स्पायर अकॅडमी (छत्रपती संभाजीनगर) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, सचिव वाल्मीक सुरासे, जिल्हा परिषद सदस्य मनोज गायके पाटील, प्राचार्य बी.एम. हजारे, प्रमोद पठारे, क्रीडा शिक्षक भरत निंबाळकर, संचालक दत्तात्रय सुरासे, प्रमोद चव्हाण, मनीषा उभेदळ आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 7:55 am

कार्यकर्त्यांनी राजकारणापुरते मर्यादित राहू नये, प्रत्येक घटकाशी जोडलेले राहावे:पंडित दीनदयाळ प्रशिक्षण वर्गाचा वेरूळमध्ये समारोप‎

प्रतिनिधी | वेरूळ भाजपच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण वर्गाचा समारोप सोहळा संत जनार्दन स्वामी आश्रमाच्या भक्त निवासात झाला. पक्ष संघटन अधिक सक्षम, प्रभावी करण्यासाठी हा उपक्रम झाला. कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. समारोप कार्यक्रमाला भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे, आमदार प्रशांत बंब, जिल्हाध्यक्ष संजय खंबायते उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. संघटन कौशल्याचे महत्त्व सांगितले. नेतृत्व विकासावर भर दिला. कार्यपद्धतीतील शिस्त अधोरेखित केली. समाजाभिमुख दृष्टिकोन मांडला. कार्यकर्त्यांनी राजकारणापुरते मर्यादित राहू नये, असे त्यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकाशी जोडलेले राहावे, असेही स्पष्ट केले. प्रशिक्षण वर्गात विविध सत्रे झाली. पक्षाची मूलभूत विचारसरणी समजावली. आधुनिक राजकीय कार्यपद्धतीवर मार्गदर्शन झाले. बूथ स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत संघटन मजबूत करण्यासाठी नियोजन शिकवले. समन्वयाचे धडे दिले. जनसंपर्कावर भर दिला. प्रभावी संवाद कौशल्यांचा अभ्यास करून देण्यात आला. प्रत्येक कार्यकर्ता संघटनेचा कणा आहे, असे सांगण्यात आले. जबाबदारीने काम केले तरच पक्षाची पकड भक्कम होईल, असेही नमूद झाले. मान्यवरांनी विकासात्मक मुद्द्यांवर भर दिला. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा उभारणीचा उल्लेख केला. शहरी भागातील पायाभूत सुविधांची गरज मांडली. शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांवर चर्चा झाली. युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची गरज सांगितली. महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. केंद्र व राज्य शासनाच्या जनहितकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असे सांगण्यात आले. योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी मतदारसंघातील भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, जिल्हा सरचिटणीस विकास कापसे, ज्ञानेश्वर नलावडे, अरुण अघाडे, शिवाजी गायकवाड, रावसाहेब देशमुख उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य ः या प्रशिक्षण वर्गामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य दिसले. आत्मविश्वास वाढल्याचे चित्र होते. कामाची नवी ऊर्जा निर्माण झाल्याचेही जाणवले. कार्यक्रमाच्या शेवटी अनेक कार्यकर्त्यांनी अनुभव सांगितले. प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष कामात करण्याचा निर्धार व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 7:53 am

जि. प. च्या विद्यार्थ्यांना आता‎ई-क्लासरूममधून शिक्षण‎:जिल्हा परिषद सदस्य विद्या गायकवाड यांची माहिती‎

प्रतिनिधी | करमाड गिरनेरा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आधुनिक शिक्षणाला चालना देण्यासाठी उभारण्यात आलेल्या ई-क्लासरूम तयार करण्यात आल्या आहेत. संगणक ज्ञानासह विविध भाषांचे प्रशिक्षण या ठिकाणाहून देण्यात येणार आहे. या ई क्लासरूमचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य विद्या रमेश गायकवाड यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी जागतिक स्तरावरील स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत करण्याचे आश्वासन यावेळी गायकवाड यांनी दिले. विद्या गायकवाड यांनी सांगितले की, आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व तंत्रज्ञानाधारित शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. ई-क्लासरूमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दृश्य-श्राव्य पद्धतीने शिक्षण मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होईल.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 7:31 am

‘त्या’ एका कृतीने नवजात बालकाला जीवदान:कुंडलेंनी जागवल्या आठवणी

प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सेवेत तब्बल ३९ वर्षे अविरत कार्यरत राहिलेल्या आरोग्य सहाय्यिका कुसुम भुजंगराव कुंडले (मोरे) यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा सोमवारी (३० मार्च) शेंदूरवादा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या उत्साहात पार पडला. कर्तव्यनिष्ठेचा वारसा जपत निवृत्त होत असताना, त्यांनी आपल्या कारकीर्दीतील एक थरारक आणि भावनिक अनुभव कथन केला, ज्याने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणले. आठवणींना उजाळा देताना कुंडले म्हणाल्या की, चापानेर येथे कार्यरत असताना एक अत्यंत कठीण प्रसंग ओढवला होता. एक माता रुग्णालयात आली, तिची प्रसूती झाली; मात्र जन्मलेले बाळ रडत नव्हते. अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध नसताना, डगमगून न जाता मी त्या बाळाला सीपीआर दिला. काही क्षणांतच बाळ रडू लागले व त्याचे प्राण वाचले. स्वतःच्या मुलाला जन्म देऊन आई झाले तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता, त्यापेक्षा अधिक आनंद त्या बाळाचे प्राण वाचवून झाला, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 7:31 am

कातपूर शेत शिवारामध्ये‎नीलगाईंनी मांडला उच्छाद‎:बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी‎

प्रतिनिधी | पैठण तालुक्यातील कातपूर शिवारात नीलगाईंचा मोठ्या प्रमाणावर उच्छाद वाढला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. रात्री नीलगाईंचे कळप शेतात घुसून उभ्या पिकांची नासधूस करत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या संदर्भात कातपूर येथील शेतकरी दीपक मोरे यांनी वन विभागाने तातडीने उपाययोजना करून नीलगाईंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. ‘दररोज पिकांचे नुकसान होत असून शेती करणे अवघड झाले आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढावा,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सोयाबीन, हरभरा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, अशी नाराजीही व्यक्त होत आहे. दरम्यान, वन विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी कातपूर येथील शेतकरी दीपक मोरे यांनी केली आहे. दरम्यान, कातपूर शिवारात नीलगाईंचा मोठ्या प्रमाणावर उच्छाद वाढला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. रात्री नीलगाईंचे कळप शेतात घुसून उभ्या पिकांची नासधूस करत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.कातपूर येथील शेतकरी दीपक मोरे यांनी वन विभागाने तातडीने उपाययोजना करून नीलगाईंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, नीलगाई, रानटी डुकरे, हरणांचे कळपही पिकांचे मोठे नुकसान करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 7:30 am

श्री भगवान महावीर जयंतीनिमित्त‎ पैठण शहरात काढली शोभायात्रा‎:जयंती शहरातील महावीर चौकातून शोभायात्रेस प्रारंभ, नागरिकांची मोठी उपस्थिती‎

प्रतिनिधी | पैठण शहरात श्री भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी महावीर चौकातून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे, विजय पापडीवाल, रवींद्र काळे, विलास पहाडे, स्वदेश पांडे, भूषण कावसनकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, नगरसेवक महेश मुंदडा, ज्ञानेश्वर दहिवाळ, गौरव आठवले, मधुसूदन मुंदडा, गणेश वरकड, स्वप्निल साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. महावीर चौक फुलांची सजावट व विद्युत रोषणाईने झगमगून गेलर होतर. सर्वप्रथम महावीर चौक येथे महावीर स्तंभाला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत श्री भगवान महावीरांची मूर्ती पालखीत ठेवून पालखीला फुलांनी सुंदर सजवण्यात आले होते. महावीर भगवान यांची प्रतिमा सुशोभित रथामध्ये ठेवण्यात आली होती. सर्व समाजबांधव पारंपरिक वेशभूषेत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीस महावीर स्तंभापासून सुरुवात करण्यात आली. तेथून जिजाऊ चौक, बसस्थानक, महाराणा प्रताप चौक, शिवाजी महाराज चौक मार्गे जैन मंदिरापर्यंत मिरवणूक काढली. दरम्यान, ठिकठिकाणी सडा व रांगोळ्या काढण्यात आल्या. भगवान महावीर यांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. शोभायात्रेमध्ये महिलांनी ठिकठिकाणी फेर धरले होते. शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी थंडपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. या मिरवणुकीवेळी सुनील बलदवा, जुगलकिशोर लोहिया, गणेश लोहिया, सुमीत गंगवाल, पवन चांदीवाल आदी नागरिक उपस्थित होते. महिला मंडळाच्या वतीने भजन संध्याचे आयोजन मिरवणूक जैन मंदिर येथे गेल्यावर श्री भगवान महावीर यांचे अभिषेक करून सर्व समाज बांधवांना महाप्रसाद देण्यात आला. यावर्षीचे महाप्रसादाचे यजमान नरेंद्र मदनलाल बडजाते होते. महाप्रसादापूर्वी महिला मंडळाच्या वतीने भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती महावीर जयंती समितीचे अध्यक्ष सचिन पहाडे, शितल कासलीवाल, विशाल काला यांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 7:29 am

आपेगाव, आमठाण्यात गारपीट; एक तास पाऊस:पिंपळदरी, लाडसावंगी, गंगापूरमध्येही नुकसान; सिल्लोडला ३ शेळ्या, १ म्हैस दगावली‎

सिल्लोड, फुलंब्रीसह पैठण तालुक्यात सोमवारी (दि. ३०) अवकाळी पावसासह गारपीट झाली. वादळी वाऱ्याचा जोर अधिक असल्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या गहू, हरभरा, मका व आंबा पिकांना याचा फटका बसला. शेतकरी हवालदिल झाले आहेत. पैठणसह तालुक्यातील आपेगाव, कचनेर, जायकवाडी परिसर तसेच कारखाना भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. आपेगावमध्ये अनेक वर्षे जुनी असलेली वडाची झाडे पडली. अनेक घरांवरील पत्रेही उडाले, असे माऊली मुळे यांनी सांगितले. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठाही विस्कळीत झाला होता. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या. खांबांचेही नुकसान झाले. वीजपुरवठा खंडित झाला होता. सिल्लोड तालुक्यातील अंभई येथील गट नं. ३८४ मधील शेतकरी नितीन मोहनसिंग मुंढे यांची एक म्हैस व केऱ्हाळा येथील शेतकरी इरफान खा शब्बीर खा यांच्या ३ शेळ्या विज पडून दगावल्या. तसेच सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील शेतकरी शेषराव कोल्हे गट नंबर ३६८ मध्ये वीज पडल्याने चारा जळून खाक झाला. सोयगाव : एक तास हजेरी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ज्वारी, कांदा बियाणे, मका व बाजरी पिके जमीनदोस्त झाली आहेत. तालुक्यात काही ठिकाणी गारांचा हलका माराही झाला. अनेक भागांत जोरदार वारे होते. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. घोसला, तिडका, बनोटी, नांदगाव, उमरविहीरा व आंजोळा परिसरात पावसाचा सर्वाधिक फटका बसला. काढणीला आलेल्या ज्वारीसह मका, बाजरी पिके आडवी झाली. कांदा बियाणे पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात सलग तिसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. यापूर्वी दोनदा झालेल्या अवकाळीमुळे जिल्ह्यात ८४५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. काही ठिकाणी पंचनामे झाले. काही ठिकाणी पंचनामे सुरू असतानाच पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात दरवर्षी ८० टक्के पाऊस पडतो. यातील ६० टक्के पाऊस पावसाळ्यात पडतो. उर्वरित २० टक्के पाऊस अवकाळीच्या स्वरूपात येतो. तीन एप्रिलपर्यंत अवकाळी व गारपिटीची शक्यता आहे. खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी काढणीस आलेली पिके काढावीत. तासभर कोसळलेल्या या पावसाने मोठे नुकसान केले. गारांचा हलकासा मारा देखील झाला. शेती पिकांवर मोठा परिणाम झाला. उन्हाळी मका, कांदा व गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच झाडांवर लगडलेले गावरान आंबे मोठ्या प्रमाणात खाली पडले. आंबा पिकाला फटका बसला आहे. आपेगाव येथे वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. हनुमान मंदिराशेजारील मेन रोडवर मोठे वडाचे झाड पडले होते. यामुळे गावात जाण्यासाठीचा पायी असलेला रस्ता बंद झाला होता. फळधारणेला आलेल्या मोसंबी व आंबा फळांचे जवळपास ६० टक्के नुकसान झाल्याचे शेतकरी भाऊसाहेब औटे यांनी सांगितले. तीन विजेचे पोल पडले होते. आमठाणा परिसरात दुपारी २ ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपीट झाली. अवघ्या १० दिवसांपूर्वीही या भागात गारपीट झाली होती. आमठाणा बसस्थानकापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या पिंपळाच्या झाडावर वीज कोसळली. झाडाला आग लागली होती. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. पैठण तालुक्यातील आपेगाव परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी गारांचा असा खच पडला होता.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 7:28 am

‘यशस्विनी’, अजिंठा बँकेच्या संचालकांची मालमत्ता जप्त:75 कोटी 90 लाखांच्या मालमत्तांचा करणार लिलाव

ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अजिंठा अर्बन को-ऑप. बँक आणि यशस्विनी महिला स्वयंसहायता गटाची सहकारी पतसंस्था या दोन संस्थांच्या अध्यक्षांसह संचालकांच्या तब्बल ७५ कोटी ९० लाख रुपयांच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर टाच आणली आहे. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पाठवलेल्या प्रस्तावानुसार राज्य शासनाने ही मालमत्ता अटॅच करण्याचे आदेश काढले आहेत. अजिंठा बँकेत ठेवीदारांचे पैसे मुदतीत न दिल्याने शासनाने १२ मार्च २०२६ रोजी आदेश काढून अध्यक्ष सुभाष माणकचंद झांबड आणि इतर आरोपींच्या एकूण २९ स्थावर मालमत्ता, बँक खात्यातील रक्कम अशी तब्बल ६६ कोटी ३२ लाखांची मालमत्ता संरक्षित केली. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी (छत्रपती संभाजीनगर) यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. यशस्विनी पतसंस्थेत १६ मार्च २०२६ रोजी आदेश काढत पवन देविदास आधाने आणि इतर आरोपींच्या तब्बल ६१ स्थावर मालमत्ता आणि बँक खाती अशी एकूण ९ कोटी ५८ लाखांची मालमत्ता संरक्षित केली. यासाठी कन्नडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार आणि त्यांच्या पथकाने सहायक निरीक्षक मोसीन सय्यद, ज्ञानेश्वर अवघड यांच्या पथकाने तपास करून हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. व्हॉट नेक्स्ट- मालमत्ता विकून पैसे देणार सक्षम प्राधिकारी (एसडीओ) आता या जप्त केलेल्या स्थावर मालमत्तांचे सरकारी मूल्य ठरवतील. त्यानंतर न्यायालयातून परवानगी मिळवून मालमत्तांचा लिलाव केला जाईल. त्यातून मिळणारा पैसा ठेवीदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात परत दिला जाईल. या मालमत्तांची विल्हेवाट लावणे किंवा हस्तांतर करण्यावर आता पूर्णतः बंदी आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 7:17 am

शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्या येत्या दोन मेपासून सुरू होणार:येत्या 15 जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाला होणार प्रारंभ

शाळांना येत्या २ मेपासून उन्हाळी सुट्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होणार आहे. या नव्या शैक्षणिक वर्षाच्या तासाला त्याच दिवशी सुरुवात होईल. विदर्भातील शाळा इतर शाळांच्या तुलनेत उशिरा सुरू होतात. ती पद्धत यंदापासून रद्द करण्यात आली आहे. राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी यंदा विदर्भातही एकसमान वेळापत्रक असेल. त्यांनाही २ मेपासून अधिकृतपणे उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी या संदर्भातील काढलेल्या परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. दरवर्षी जूनमधील तीव्र उष्णतेमुळे विदर्भातील शाळा साधारण ३० जूननंतर सुरू करण्याची पद्धत होती. या वर्षी विदर्भासह सर्व विभागांतील शाळा १५ जूनपासूनच सुरू होतील. तापमानाचा विचार करून शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात विदर्भातील शाळांची वेळ मर्यादित ठेवण्यात आली आहे. १५ ते २७ जूनदरम्यान या शाळा सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत भरतील. त्यानंतर ३० जूनपासून नियमित वेळापत्रक लागू होईल. दरम्यान, इतर मंडळांच्या शाळांनी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. इनसाइड स्टोरी- दहावी, बारावीच्या निकालाच्या प्रक्रियेमुळे या वर्षी बदल आतापर्यंत विदर्भ वगळता सर्व शाळा १५ जूनला रविवार येत असल्याने १६ जूनलाच सुरू करण्यात येत होत्या. आता मात्र त्यात बदल केला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकर घेण्यात आल्या आहेत. दहावी, बारावीच्या निकालाच्या प्रक्रियेमुळे इतर वर्गांसाठी हा बदल केला आहे. जिल्ह्यात पहिल्या वर्गासाठी नव्या शैक्षणिक सत्राची तयारी मार्चमध्येच सुरू केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 7:15 am

आर्थिक शिस्त न पाळल्यास महिलांच्या हक्काचे महामंडळ रसातळाला:जनतेचा पैसा उधळणे यासारख्या गंभीर बाबींमुळे महामंडळाच्या क्रेडिबिलिटी’वरच प्रश्नचिन्ह झाले उपस्थित

महिला सक्षमीकरणाचा डोलारा मिरवणाऱ्या ‘महिला आर्थिक विकास महामंडळा’चा (माविम) ५० वा वार्षिक अहवाल विधान मंडळात सादर करण्यात आला असून, या अहवालाने महामंडळाच्या कारभारातील लक्तरे वेशीवर टांगली आहेत. लेखापरीक्षकांनी ओढलेले ताशेरे आणि दिलेले गंभीर इशारे पाहता, महामंडळ हे महिला कल्याणाऐवजी आर्थिक अनागोंदी आणि प्रशासकीय ढिसाळपणाचे केंद्र बनले आहे की काय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. कोट्यवधींची सरकारी देणी थकवणे, हिशेबांचा ताळमेळ नसणे आणि न्यायालयीन दंड भरण्यात जनतेचा पैसा उधळणे यांसारख्या गंभीर बाबींमुळे महामंडळाच्या “क्रेडिबिलिटी’वरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लेखापरीक्षकांच्या मते, जर “माविम’ने आपली अंतर्गत नियंत्रण प्रणाली युद्धपातळीवर सुधारली नाही, तर महामंडळाचे आर्थिक आरोग्य पूर्णपणे कोलमडून पडू शकते. म्हाडाची कोट्यवधींची थकबाकी वांद्रे येथील मुख्यालयाचे १९९८ पासूनचे सुमारे १४.९२ कोटी रुपये भाडे आणि अ‍ॅम्नेस्टी शुल्क अद्याप म्हाडाला अदा करण्यात आलेले नाही. एका सरकारी संस्थेने दुसऱ्या सरकारी संस्थेचे पैसे तब्बल अडीच दशके थकवणे, हे महामंडळाचे अत्यंत गंभीर प्रशासकीय अपयश मानले गेले आहे. सक्षम ‘इंटरनल ऑडिट टीम’ची नियुक्ती करण्याची शिफारस महामंडळाचा राज्यभरातील विस्तार पाहता सध्याची अंतर्गत लेखापरीक्षण यंत्रणा पूर्णपणे तोकडी आणि कुचकामी ठरली आहे. जिल्हा स्तरावरील खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी एका सक्षम ‘इंटरनल ऑडिट टीम’ची नियुक्ती करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. वैधानिक देणी थकवल्याने दंडाचा धोका महामंडळाने काही प्रकरणांत इन्कम टॅक्स आणि इतर वैधानिक देणी वेळेत भरलेली नाहीत. यामुळे भविष्यात सरकारला मोठा दंड किंवा व्याजाचा बोजा सहन करावा लागू शकतो. अशा प्रकारचा ‘संभाव्य देयता’चा डोंगर कमी करणे ही महामंडळासाठी आता अस्तित्वाची लढाई ठरली आहे. न्यायालयीन खटल्यांचा भुर्दंड “सृष्टी नर्सरी’ आणि इतर प्रलंबित कायदेशीर प्रकरणांमुळे महामंडळाला व्याजासह मोठी रक्कम मोजावी लागत आहे. केवळ न्यायालयीन अटींची पूर्तता करण्यासाठी ४.८१ कोटी रुपये न्यायालयात जमा करावे लागले आहेत, असेही यात नमूद करण्यात आल आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द होण्याची आली नामुष्की ५० व्या वर्षाचा लेखापरीक्षित अहवाल वेळेत तयार न झाल्यामुळे २५ सप्टेंबर २०२५ रोजी नियोजित असलेली वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द करण्याची नामुष्की ओढवली. ही बाब कंपनी कायद्याच्या तरतुदींचे थेट उल्लंघन असून, अशा प्रकारचा विलंब टाळण्यासाठी लेखा विभागाला विशेष निर्देश देण्यात आले आहेत. सॉफ्टवेअर त्रुटी, तांत्रिक मागासलेपणा महामंडळाचे आर्थिक व्यवहार आणि बचत गटांची माहिती संकलित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. डेटा एन्ट्री आणि रिपोर्ट जनरेशनमध्ये मानवी हस्तक्षेप कमी करून ‘डिजिटल ट्रान्सपरन्सी’ (डिजिटल पारदर्शकता) आणणे अनिवार्य असल्याचे अहवालात म्हटले आहे. आर्थिक शिस्तीचा पूर्णतः अभाव लेखापरीक्षकांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत ताशेरे ओढले आहेत की, महामंडळाच्या जिल्हा कार्यालयांनी आणि मुख्य कार्यालयाने आपापल्या हिशेबांचे मेळ अद्याप पूर्ण केलेले नाही. ही बाब केवळ तांत्रिक चूक नसून, आर्थिक गैरव्यवहारांना सरळ सरळ वाव देणारी आहे. ही परिस्थिती तातडीने सुधारण्याची कडक ताकीद देण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 7:10 am

बनावट दिव्यांग; बीडचे आठ शिक्षक निलंबित:कर्णबधिर असल्याचे खोटे दिव्यांग प्रमाणपत्र दिले

कर्णबधिर असल्याचे दिव्यांग प्रमाणपत्र देऊन शासकीय सुविधांचा लाभ मिळवणाऱ्या आठ शिक्षकांचे दिव्यांगत्व पुनर्तपासणीत कमी किंवा अगदीच सामान्य आढळून आले. खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचा ठपका ठेवत त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी सेवेतून निलंबित केले आहे. एकाच दिवशी आठ शिक्षकांचे निलंबन झाल्याने खळबळ उडाली आहे. आणखी काही शिक्षक रडारवर आहेत. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या तपासणीचे आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार बीड जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. दरम्यान, कर्णबधिर दिव्यांगत्व प्रमाणपत्र असलेल्या शिक्षकांची तपासणी मुंबईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हेअरिंग डिसॅबिलिटी या संस्थेत केली होती. याचे अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. या अहवालातून आठ शिक्षक कर्णबधिर नसतानाही त्यांनी तशा प्रकारचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र देऊन लाभ मिळवल्याचे स्पष्ट झाले. फौजदारी शक्य, दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद अशा प्रकारे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून लाभ मिळवणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिस कारवाईची टांगती तलवार आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात २ वर्षांपर्यंत शिक्षा व १ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षेची तरतूद आहे.या आठ जणांचा समावेश संतोष सोनवणे (जि. प. शाळा खांडेकर वस्ती, ता. बीड), विलास माचवे (जि. प. शाळा पिंपळा धायगुडा, ता. अंबाजोगाई), विकास माचवे (जि. प. शाळा टिळकनगर, अंबाजोगाई), शिवाजी चव्हाण (जि. प. शाळा जोडवाडी, ता. अंबाजोगाई), मच्छिंद्र वाघमारे (जि. प. शाळा आगरनांदूर, ता. गेवराई), दादासाहेब पवार (जि. प. शाळा वडार कॉलनी, अंबाजोगाई), युवराज लांब (जि. प. शाळा हनुमंत पिंप्री, ता. केज), अंबिका बगाडे (जि. प. शाळा लोणीघाट, ता. बीड) यांचा समावेश आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 7:04 am

चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवात तुळजाभवानीचे व्हीआयपी दर्शन बंद:आज मध्यरात्रीपासून दर्शन; मुखदर्शनासाठी 3, धर्मदर्शनासाठी 6 तासांपर्यंत रांगेत थांबावे लागणार

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आई तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सवात दर्शनासाठी भाविकांची यंदा गर्दी होणार आहे. त्यामुळे मंदिर संस्थानच्या वतीने आवश्यक तयारी करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री १ वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्यानंतर भाविकांना मुखदर्शन व धर्मदर्शन घेता येणार आहे. गतवर्षी १० ते १२ लाख भाविकांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले होते. गतवेळीच्या तुलनेत यंदा दररोज ५० हजारांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुखदर्शनासाठी तीन ते साडेतीन तास रांगेत थांबावे लागणार आहे. धर्मदर्शनासाठी सहा तासांपर्यंत थांबावे लागणार आहे. दरम्यान, व्हीआयपी, ऑनलाइन दर्शन बंद केले आहे. २०० रुपयांचा पेड पास घेता येणार आहे. तसेच तुळजाभवानी देवस्थानच्या १०८ भक्तनिवासात १४४ खोल्या आहेत. त्यामध्ये एसीच्या दोन बेडसाठी २ हजार रुपये शुल्क आहे. नॉन एसीमध्ये चार बेड उपलब्ध असणार आहेत. या भक्तनिवासात १०० बेड अद्याप शिल्लक आहेत. भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दीपक चौक ते महाद्वार या ४०० मीटरपर्यंत भाविकांसाठी शेडनेट टाकून सावलीची व्यवस्था केली जात आहे. दर्शनाच्या पहिल्या-दुसऱ्या मजल्यावर दोन आरोग्य कॅम्प उन्हाचा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे मंदिराच्या दर्शन रांगेतील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर दोन आरोग्य कॅम्प राहणार आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव रोड ते बाबाजी अड्डा, जुने बसस्थानक अशा तीन ठिकाणी ५ आरोग्य कॅम्प लावण्यात आले.मंदिरात सकाळी, दुपार, संध्याकाळ अशा तीन वेळा आरोग्य सेवा दिली जाणार आहे. एका कॅम्पवर दोन वेळा सेवा दिली जाणार आहे. देवीला बारा महिने राजघराण्याचा नैवेद्य आई तुळजाभवानीला बारा महिने छत्रपती राजघराण्याचा नैवेद्य दिला जातो. त्यासाठी राजघराण्यांनी नेमलेला पुजारी आहे. या पुजाऱ्यामार्फत हा नैवेद्य दिला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. चैत्रोत्सवात गावातील लोकांना नैवेद्याचा मान दिला जातो. यात्राकाळात देवीची दैनंदिन पूजा अशी देवस्थानच्या वतीने २०० रुपयांचे पेड पासेस चैत्रोत्सवानिमित्त व्हीआयपी दर्शन २ एप्रिलपर्यंत तर ऑनलाइन दर्शन ५ एप्रिलपर्यंत बंद करण्यात आले आहे. याशिवाय २०० रुपयांचे पेड पासेस देवस्थानच्या वतीने सुरू करण्यात आले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 6:50 am

10 ‘स्वीकृत’साठी 264 अर्ज; भाजप, उद्धवसेना, शिवसेनेची नावे गुलदस्त्यात:महापालिकेत घराणेशाहीची तगडी सेटिंग; निष्ठावंतांच्या नशिबी नेहमीचीच वेटिंग?

ज्या कार्यकर्त्यांनी उन्हातान्हात पक्षाचे झेंडे खांद्यावर घेतले, ज्यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या रणांगणात नेत्यांच्या विजयासाठी मेहनत घेतली, त्या निष्ठावंतांना पुन्हा एकदा वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या १० स्वीकृत जागांसाठी तब्बल २६४ अर्जांचा डोंगर उभा राहिला असला, तरी आतली सेटिंग मात्र खासदार, आमदार आणि नेत्यांच्या नातेवाइकांसाठीच असल्याची चर्चा आहे. प्रशासकीय कामात अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींची मदत व्हावी, या उदात्त हेतूने ‘स्वीकृत’ सदस्यत्वाची तरतूद करण्यात आली, पण शहरात मात्र या जागेचा वापर ‘घराणेशाही’चे पुनर्वसन करण्यासाठी केला जातोय, अशी चर्चा आहे. माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांची भगिनी डॉ. उज्ज्वला दहीफळे आणि पुत्र हर्षवर्धन कराड या दोघांनीही शड्डू ठोकला आहे, तर भाजपचे आमदार संजय केणेकर यांनीही आपले चिरंजीव हर्षवर्धन केणेकर यांच्यासाठी फील्डिंग लावल्याची चर्चा आहे. सत्ताधारीच नव्हे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही आपले बंधू राजेंद्र दानवे यांचा अर्ज भरून ‘घराणेशाही’च्या शर्यतीत सहभाग नोंदवला आहे. शिंदेसेनेकडून काही माजी नगरसेवकांची नावे पुन्हा चर्चेत आहेत. आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का? “निवडणुकीत घाम आम्ही गाळायचा, लाठ्या-काठ्या आम्ही खायच्या. सत्तेची मलई मात्र साहेबांच्या पोरांनी आणि नातेवाइकांनी चाखायची? मग आमच्या निष्ठेची किंमत काय?’ हा संतप्त सवाल स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांनी केला आहे. शब्द हवेत विरले; कार्यकर्त्यांचा घात! लोकसभा, विधानसभा आणि मनपा निवडणुकीच्या वेळी नेत्यांनी प्रत्येक सक्रिय कार्यकर्त्याला “आता थांबा. स्वीकृतमध्ये तुमचं बघू.’ असा शब्द दिला होता. मात्र आता ऐनवेळी आपल्याच नातेवाइकांचे अर्ज दाखल करून नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा दिला आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 6:45 am

राज्यात अवकाळी, 20 जिल्ह्यांत अलर्ट:कारण - पश्चिम विक्षोभाचे वारे राज्यभर सक्रिय; अंदाज - 3 एप्रिलपर्यंत गारपीट, पाऊस होईल

पश्चिमी विक्षोभाचे वारे महाराष्ट्रातही सक्रिय झाल्याने सोमवारी छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, जळगाव, नंदुरबार, धुळे, अकाेला, यवतमाळ, बुलडाणा, साताऱ्यासह १६ जिल्ह्यांत वादळी पाऊस, गारपीट झाली. त्यात राज्यातील सुमारे ९० हजार हेक्टरवरील पिके, भाज्या, फळांचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानीची अंतिम आकडेवारी मंगळवारी पंचनामे झाल्यास समोर येईल. दरम्यान, सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता महाकाळा (ता. अंबड, जि.जालना) येथे महादेव मंदिरात दर्शनासाठी निघालेले गोविंद प्रल्हाद लहाने (२१) आणि आदित्य दगडू बेद्रे (२०) वीज पडून जागीच ठार झाले. समर्थ वाघमारे गंभीर जखमी झाला. ते लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याशिवाय लोणी खुर्दमधील मापरवाडी (ता. राहता, जि. अहिल्यानगर) येथील शेतकरी सोमनाथ जिजाबापू गाडगे (३५) यांचाही वीज पडून मृत्यू झाला. वनपट (ता. मालेगाव) येथे घराची भिंत कोसळून दबल्याने यश प्रवीण शिंदे (१४) या मुलाचे प्राण गेले. सातारा जिल्ह्यातील आसले, मोरवे येथे २५ मेंढ्या मरण पावल्या. दरम्यान, १ ते ३ एप्रिलदरम्यान पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एक्स्पर्ट - मराठवाडा, विदर्भात तापमान पुढील ४ दिवस २ ते ४ अंशाने घटणार पश्चिमी विक्षोभाचे वारे उत्तर भारतासह महाराष्ट्रातही सक्रिय असल्याने सांगली, सातारा, पुण्यातही पाऊस झाला. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पहिल्यांदाच गारपीट झाली झाली आहे. २ ते ३ एप्रिलपर्यंत अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस, वादळी वारे, गारपीट होईल. मराठवाडा, विदर्भातील किमान तापमानात २ ते ४ अंशांपर्यंत घट होईल असा अंदाज आहे, असे एमजीएम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. ४ एप्रिलनंतर वाढेल तापमान 31 मार्चमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, द. काेकणात पाऊस, काही ठिकाणी गारपीट 1 एप्रिलमराठवाडा, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्रात पाऊस. विजांचा कडकडाटही होऊ शकतो. 2 एप्रिलमध्य महाराष्ट्र, पुणे परिसरात वादळी व हलक्या पावसाची शक्यता. तापमानात किंचित घट. ३ एप्रिलढगाळ वातावरण कायम राहील. तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, पाऊस होईल. ४ एप्रिलवातावरण बदलेल. तुरळक ठिकाणी सरी कोसळतील. एकुणात तापमान वाढणार आहे. ५ एप्रिलमहाराष्ट्रावरील अवकाळीचे सावट पूर्णपणे दूर झालेले असेल. तुरळक पाऊस पडेल. या घाटांतून जाताना काळजी घ्या... कन्नड अजिंठा मांजरसुंबा वेरूळइमामपूर. कारण यापूर्वीच्या अवकाळी तसेच पावसाळ्यात या घाटांत दरडी कोसळल्या आहेत. विमानाच्या घिरट्या खराब हवामानामुळे शिर्डीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाने ३० मिनिटे आकाशात घिरट्या घातल्या. त्यानंतर ते सुरतला गेले आणि रात्री ११ वाजता पुन्हा शिर्डीत परतले. मेथी, पालक महागेल कोथिंबीर, मेथी आणि पालक यांसारख्या भाज्यांचे नुकसान झाल्याने त्यांचे दर २०% ते ४०% नी वाढण्याची शक्यता आहे. आंब्याची आवक लांबणीवर पडणार आहे. आंबा, द्राक्ष, टरबूज गेले वादळी वारा, गारपिटीमुळे आंब्याचा मोहर गेला. कैऱ्या खाली पडल्या. शिवाय टरबूज, खरबूज आणि द्राक्षांनाही फटका बसला. त्यांचे उत्पादन घटणार आहे. मका, गहू आडवा छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यातील मका, गहू आडवा झाल्याने त्याची गुणवत्ता कमी होणार आहे. हरभऱ्याचेही मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 6:34 am

आठवडी बाजार बंद झाला तर आत्महत्या करू:छत्रपती संभाजीनगरच्या शेतकरी व्यापाऱ्यांचा इशारा, नगरसेवक म्हणतात बाजार रस्त्यावर नको, वाचा ग्राउंड रिपोर्ट

छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका आयुक्तांची हुकूमशाही सुरू आहे. आठवडी बाजार बंद झाले, तर आम्ही आत्महत्या करू. आम्ही अफगाणिस्तानचे नसून इथलेच आहोत. आम्ही संपूर्ण आयुष्य या व्यवसायावर काढले. आमची मुले लग्नाला आली आहेत. या धंद्यावर आम्ही कर्ज काढले आहे. जर व्यवसाय बंद झाला, तर आम्ही कर्ज फेडायचे कसे आणि जगायचे कसे असा प्रश्न आम्हासमोर आहे. कामगारांचा पगार कसा द्यायचा. आम्हाला आता कोणी रोजगार देणार नाही. त्यामुळे आम्हाला चोरीचे परवाने द्यावेत. आम्ही चोऱ्या करतो किंवा महापालिका आयुक्तांनी पगार सुरू करावा, अशी मागणी भाजीपाला व्यावसायिकांनी केली. दुसरीकडे नगरसेविकांनी बाजार रस्त्यावर भरू नये, तो गाळ्यात भरावा अशी भूमिका मांडली. छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा, जाफर गेट आणि शहानूरमियाँ दर्गा (पीर बाजार) येथील ऐतिहासिक आठवडी बाजार कायमचे बंद करण्याची घोषणा महापालिका आयुक्तांनी केलीय. विशेष म्हणजे या भागात सध्या भाजीपाला मंडईची महापालिकेची कसलिही योजना नाही. तत्पूर्वीच हे बाजार आता बंद केले जाणार आहेत. त्यामुळे दिव्य मराठी डिजिटलने शहानूरमियाँ दर्गा येथील आठवडी बाजारात जाऊन व्यापारी, नागरिक आणि राजकीय नेत्यांची मते जाणून घेतली. त्याचाच हा ग्राउंड रिपोर्ट... सध्याची स्थिती काय? सध्याचे छत्रपती संभाजीनगर आणि पूर्वाश्रमीच्या औरंगाबाद महापालिकेची स्थापना 8 डिसेंबर 1982 रोजी झाली. तत्पूर्वी येथे नगरपालिका होती. शहराच्या हद्दीत 18 गावांचा समावेश करून तिला महापालिकेचा दर्जा दिला गेला. विशेष म्हणजे या महापालिकेच्या स्थापनेपूर्वीपासून सुरू चिकलठाणा, जाफर गेट आणि शहानूरमियाँ दर्गा (पीर बाजार) येथे आठवडी बाजार भरतात. सध्या छत्रपती संभाजीनगरची लोकसंख्या तब्बल 20 लाखांच्या घरात पोहचलीय. त्यामुळे सध्याचे असलेले आठवडी बाजार कमी पडतात. उलट या आठवडी बाजरांच्या संख्येत वाढ होण्याची गरज आहे. शेतकरी, ग्राहकांचे नुकसान छत्रपती संभाजीनगरच्या आठवडी बाजारामध्ये शेतकरी स्वतःचा भाजीपाला विकायला आणतात. विशेषतः कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण, ते चक्क सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातले शेतकरी या बाजारात येतात. प्रत्येक बाजारातून जवळपास तीस लाखांच्या घरात उलाढाल होते. मध्यस्थाविना ग्राहकांना अतिशय कमी दरात भाजीपाला आणि धान्य खरेदी करायला मिळते. आठवडी बाजार वगळता इतरवेळी याच भाजीपाल्याची किंमत ही दुप्पट ते अनेकदा चौपट असते. मात्र, हे आठवडी बाजार बंद झाले तर शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील थेट दुवाच काढून घेतला जाईल. त्यामुळे या दोघांचेही नुकसान होईल. गाळ्यामध्ये बाजार भरावा - त्र्यंबक तुपे दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना प्रभाग क्र 20 चे नगससेवक त्र्यंबक तुपे म्हणाले की, 'आठवडी बाजाराची संकल्पना अनेक वर्षांपासून आहे. शहरातील 3 प्रमुख बाजार आहेत. पीर बाजार हा रस्त्यावर भरला जावू नये असे स्थानिक नागरिकांची मागणी आहे. मनपाने जे गाळे बांधून दिले आहेत, त्या गाळ्यामध्ये हा बाजार भरावा. या बाजारामुळे रस्त्यावर पायी जाता येत नाही अशी परिस्थिती असते. काही वेळा रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत अडकतात हे आम्ही पाहिले आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या व्यापाऱ्यांना व्यापारासाठी व्यवस्था करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. महापौर आणि आयुक्तांशी झालेल्या चर्चेत एक विषय पुढे आला की आठवडी बाजार न करता प्रत्येक दिवशी बाजार करता येऊ शकतो का यादृष्टीने आम्ही काम करत आहोत. रस्त्यावर बसलेल्या व्यापाऱ्यांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी आम्ही मनपा म्हणून घेणार आहोत. दुकाने मर्यादित असले तरी जर व्यापारी वाढले, तर आपण 8 ठिकाणी भाजी मार्केट वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेक ठिकाणी बाजारांसाठी जागा दिलेली आहे. चौकातील व्यापारी जो पर्यंत गाळ्यांपर्यंत येत नाही तो पर्यंत रस्त्यावर वाहतूक कोंडी होत राहिल. रोडवर कुणीही बसता कामा नये, आम्ही त्यांची काळजी घेऊ.' बाजार रोज भरेल - सविता कुलकर्णी दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना प्रभाग क्र 26 च्या नगरसेविका सविता कुलकर्णी म्हणाल्या की, 'मनपाचा कोणाच्याही पोटावर पाय देण्याचा काही हेतू नाही. पण काय होते दर सोमवारी या परिसरातील टॅक्स भरणाऱ्या लोकांना वाहतूक कोंडी, अस्वच्छता या गोष्टींना सामोरे जावे लागते. आता प्रत्येक परिसरात भाजी घेऊन येणाऱ्या गाड्या फिरतात. ताज्या भाज्या घेण्याकडे लोकांचा ओढा दिसून येतो. मंगळवारी या ठिकाणी मोठा कचरा पडलेला दिसून येतो. हा कचरा मनपाने उचलला पाहिजे. ते उचलतात सुद्धा. हे जे लोक रस्त्यावर गाड्या लावतात त्यांच्याकडून काही लोक चुकीच्या पद्धतीने हप्ते वसुली करतात. त्यांना पावती सुद्धा देण्यात येत नाही. रोडची जागा भाड्याने देता येत नाही. आम्ही आठवडी बाजाराच्या ठिकाणी ओटे बांधून देणार आहोत. तिथे दररोज भाजी विक्री सुरू होऊ शकते. कुणाच्याही पोटावर पाय देण्याचा आमचा हेतू नाही. पण दादागिरी करत रस्त्यावर गाड्या लावू नये यासाठी मनपाने हा निर्णय घेतला आहे. पीर बाजार आणि शहागंमध्ये भरणारा बाजार याची तुलना होऊच शकत नाही. तिथे रहिवासी वस्ती कमी आहे, पण त्यांनी कारवाईची मागणी केली, तर तिथेही कारवाई करण्यात येईल. या परिसरातील लोकांनी मागणी केल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे. बाजार बंद करणार नाही, तर रोजचा बाजार सुरू करणार आहोत. केवळ रस्त्यावर भरणाऱ्या बाजाराला आमचा आक्षेप आहे.' पोटावर पाय नको - अर्चना नीळकंठ दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना प्रभाग क्र 20 च्या नगरसेविका अर्चना नीळकंठ म्हणाल्या की, 'आमच्या प्रभागातील काही भागातील नागरिकांनी आम्हाला निवेदन दिले की पीर बाजारमुळे आम्हाला त्रास होतो. वाहतूक कोंडी होते. अस्वच्छता राहते. त्यामुळे हा बाजार बंद व्हावा ही नागरिकांची इच्छा आहे. पण कोणाच्या पोटावर पाय पडावा असे आमचे म्हणणे नाही. आठवडी बाजार नियोजित जागेत भरावा. ज्यामुळे जनतेला होणारा त्रास होणार नाही. आठवडी बाजार बंद करायचा का नाही या विषयी आयुक्त आणि महापौर निर्णय घेतील.' आधी पाणी, गाळ्याचे पाहा दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना तरुण शेतकरी व्यापारी म्हणाला की, 'आपल्याकडे लोकशाही राहिली नाही. राजेशाही सुरू आहे. ज्याच्याकडे सत्ता आहे, लोक काहीही करू शकतात. आमच्याकडे चौदा दिवस पाणी येत नाही. ज्यांचे गाळे पाडले ते दिले नाहीत. शहरात अनेक प्रश्न आहेत. मात्र, त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. बाजाराच्या दिवशी वाहतूक कोंडी होते म्हणतात, पण आम्ही व्यापारी त्यावर काय करणार? स्वच्छतेचे काम मनपाने केले पाहिजे. आम्ही इथे बसण्याचे पैसे देतो. गाडी आत आणायचे पैसे देतो. आम्हाला पैसे देऊन सुद्धा काहीही सुविधा दिली जात नाही. चिखल साफ करत बसावे लागते. तुम्ही आमच्या जागेवर येऊन विचार करा ना? आम्ही काही अफगाणचे नाही. आमच्या आठवडी बाजाराला ना भाजपचा विरोध आहे, ना दुसऱ्या कोणत्या पक्षाचा. केवळ मनपा आयुक्तांचा बाजाराला विरोध आहे. त्यांना वाटते तसे ते वागतात.' विषय दिल्लीपर्यंत नेणार दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना शेतकरी व्यापारी म्हणाला की, 'आठवडी बाजारात आम्ही हजारोंच्या संख्येने बसलेलो आहोत आणि महापालिका मोजकेच गाळे बांधून देणार आहे. मग बाकीच्या व्यापाऱ्यांनी कुठे जायचे. मनपा त्यांना नोकरी देणार का? आमचे सर्व घर यावर चालते. हे जर बंद झाले तर आम्ही काय करावे? हजारो व्यापाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. आम्ही या संदर्भात महापौर, उपमहापौर यांची भेट घेणार आहोत. या संदर्भात रोहित पवारांची भेट घेणार असून त्यांच्या मार्फत हा विषय मुंबई आणि जर काहीच झाले नाही तर सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून हा विषय आम्ही दिल्लीपर्यंत नेऊ पण थांबणार नाही.' एका ठिकाणी बसू शकत नाही ज्येष्ठ व्यापारी म्हणाले की, 'आठवडी बाजारासाठी जी जागा नियोजित केली आहे, त्याच्या बाहेर बसणाऱ्या लोकांवर महापालिकेने कारवाई केली पाहिजे. आमच्याकडून जी वसुली केली जाते त्यातून स्वच्छता केली गेली पाहिजे. जे लोक रस्त्यावर बसतात ते दादागिरी करतात. त्यांना उठवणे आमचे काम नाही. हे काम महापालिकेने केले पाहिजे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगरसह महाराष्ट्रातल्या अनेक शहरात असे बाजार भरतात. कुठल्याही मनपा आयुक्तांनी असा निर्णय घेतलेला नाही. संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी होते ती काही आमच्यामुळे नाही. शहरात वाहतूक कोंडी होते म्हणून तुम्ही लोकांना गाड्या बाहेर काढू नका, असे सांगणार का? आम्ही बाजार करणारी लोक इथे घाण करत नाही. ही घाण दुसरे व्यापारी इथे आणून टाकतात. आम्ही एकाच ठिकाणी गाळे घेऊन बाजारात बसू शकत नाही. आम्ही आठ दिवस 8 बाजारात जात व्यवसाय करतो.' वसुली केली जाते, पावती मिळत नाही एका फळ विक्रेता महिला म्हणाली की, 'मनपा दुसरीकडे बाजारासाठी जागा देईल, पण तिथे ग्राहक येतील का? आम्ही रोडवर नसतो, गेली 20 वर्षे आम्ही बाजारात येतो. हे हातगाडीवाले रस्त्यावर गाड्या लावतात. आम्ही यावर लोन काढले आहे. हे जर बंद झाले तर आम्ही जगायचे कसे?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. फळ विक्रेता म्हणाला की, 'रोडवर ज्या गाड्या लागतात त्या लागू नये. सर्व दुकाने ठरलेल्या जागेत लागावी म्हणजे कोणालाही त्रास होणार नाही. आम्हाला बाजाराच्या दिवशी 100 रुपये द्यावे लागतात. त्यांची पावती मिळत नाही,' अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तर महिला ग्राहक म्हणाली की, 'आठवडी बाजार सुरू राहिला. हा बाजार जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मध्यभागी असलेला हा बाजार जर बंद झाला तर नागरिकांची मोठी गैरसोय होईल. जी अधिकृत जागा आहे ती कमी पडते, म्हणून हे व्यापारी, शेतकरी इथे बसतात त्यांच्याकडे पाहून हा बाजार बंद करू नये.' बाजार नियोजित जागेतच भरावा दुसऱ्या एका व्यापाऱ्याने बोलताना म्हटले आहे की, 'जर रस्त्यावर बाजार भरणार असेल तर मग हा बाजार बंद झालेलाच बरा. बाहेरचा बाजार बंद झाला आणि मध्ये सुरू राहिला तरच बाजाराचा फायदा आहे. बाहेर गर्दी होते गाडी लावायला जागा नसते म्हणून लोक मध्ये येत नाहीत आणि आमचा व्यापारच होत नाही. बाहेरील व्यापारी पैसे देतात म्हणून मनपावाले त्यांना बाहेर बसू देते. त्यांच्यामुळेच आमचा व्यवसाय होत नाही. मनपा आयुक्तांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. बाहेरील व्यापारी बंद झाले तरच मध्ये बसणाऱ्या लोकांचा व्यवसाय होऊ शकतो.' बाजार रोडवर नकोच, स्थानिकांना त्रास होऊ नये - सागर नीलकंठ भाजप पदाधिकारी सागर नीलकंठ म्हणाले की, आठवडी बाजार हा नियोजित जागेत भरला पाहिजे. स्थानिक लोकांना याचा त्रास होतो आणि वाहतूक कोंडी होते. पण त्यावर तो बंद करणे हा उपाय नाही. लोकांना त्रास होऊ नये हे अपेक्षित आहे. जर व्यवस्थित नियोजन केले, पार्किंग व्यवस्था केली तर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकतो. बाजारात बसणाऱ्या लोकांना एक नबरिंग दिले तर त्यातून मनपाला उत्पन्न मिळू शकते. बाजार हा रोड वर भरुच नये. तो ग्राउंडममध्ये भरावा. तिथे सार्वजनिक शौचालय सुरू केले पाहिजे. स्थानिक लोकांना सुविधा मिळावा म्हणून तिथे बाजाराच्या ठिकाणी स्वच्छता केली, लोकांना त्याचा त्रास झाला नाही तर लोक बाजार बंद करा म्हणणार नाही. नीलकंठ म्हणाले, कंत्राटदाराने जर बाजार स्वच्छ ठेवला तर हा प्रश्नच येणार नाही आणि जर मनपाने केले तर अतिशय उत्तम नियोजन करता येईल. उद्दाम व्यापऱ्यांना जागा देण्यापेक्षा शेतकरी अन् छोट्या व्यापाऱ्यांना जे गरजू आहे त्यांना बाजारात स्टॉल दिले पाहिजे. जर बाजारातील व्यापारी यांनी शिस्त पाळली तर आठवडी बाजार बंद करण्याची गरजच पडणार नाही. स्मार्ट बाजार केला, सुविधा दिली तर व्यापाऱ्यांना सुद्धा फायदा होईल. मनपाने हा प्रयोग केला तर नवीन इनकम सुरु होईल.

दिव्यमराठी भास्कर 31 Mar 2026 6:29 am

शेतकरी कर्जमाफी लबाडाघरचे जेवण

-तुळजापुरात शेतकरी संघर्ष न्याय यात्रेत सपकाळ यांचा हल्लाबोल -शेतक-यांचा सातबारा कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या तुळजापूर : प्रतिनिधी शेतकरी अस्मानी, सुलतानी संकटाने त्रस्त असून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, आत्महत्या वाढल्या आहेत, त्यातच मोदी सरकारने अमेरिकेसमोर सरेंडर होत व्यापार करार केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. भाजप […] The post शेतकरी कर्जमाफी लबाडाघरचे जेवण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Mar 2026 1:16 am

जालना जिल्ह्यात वीज कोसळून २ तरुण ठार

बीड जिल्ह्यात जनावरे दगावली, साता-यात २४ शेळ््या मृत्युमुखी छ. संभाजीनगर : प्रतिनिधी पुणे, नाशिक, सातारा, धुळे, नंदूरबारसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यांत सोमवारी अवकाळीने धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी वादळी वा-यासह गारपीट झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. जालना जिल्ह्यात वीज पडून २ तरुण ठार झाले. बीड जिल्ह्यात २ गाई दगावल्या. मालेगावात भिंत कोसळून १ जण […] The post जालना जिल्ह्यात वीज कोसळून २ तरुण ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Mar 2026 1:14 am

पर्यावरण संवर्धनासाठी लातूर-नांदेड सायकल यात्रा

लातूर : प्रतिनिधी पर्यावरण संवर्धनासह प्लास्टिक मुक्ती, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पाणी आडवा पाणी जिरवा आणि मोबाईलचे दुष्परिणाम आदी विषयांवर जनजागृती करत माणूस प्रतिष्ठान संचलित माझं घरच्या विद्यार्थ्यांनी लातूर-नांदेड सायकल प्रवास नुकताच यशस्वी केला. या सायकल यात्रेमध्ये माझं घरचे प्रमुख शरद झरे व प्रा.डॉ विनोद चव्हाण यांच्यासह प्रकल्पातील एकूण २५ मुला मुलींचा सहभाग होता. नांदेड येथे […] The post पर्यावरण संवर्धनासाठी लातूर-नांदेड सायकल यात्रा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Mar 2026 1:13 am

भारताचे सेमीकंडक्टर मिशन २.० संकटात!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मध्य-पूर्वेतील युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली आणि जागतिक ऊर्जा संकट उभे राहिले. पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि खतांच्या तुटवड्याने चिंता वाढली. यातच भारताला आता एका नवीन आव्हानाचा सामना करावा लागत आहे. या संकटामुळे भारताच्या सेमीकंडक्टर मिशन २.० च्या पुढील टप्प्याच्या प्रारंभास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यावर अनिश्चिततेचे सावट घोंगावत आहे. त्यामुळे भारताची […] The post भारताचे सेमीकंडक्टर मिशन २.० संकटात! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Mar 2026 1:12 am

महादेव गोमारे यांचा राष्ट्रीय स्तरावरील जलयोद्धा पुरस्काराने सन्मान 

लातूर : प्रतिनिधी जल पुनर्भरण आणि जल व्यवस्थापन क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणारे आर्ट ऑफ लिविंगचे समन्वयक महादेव गोमारे यांना राष्ट्रीय स्तरावरील जल योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालय नीती आयोग रुडकी आयआयटी आर्ट ऑफ लिविंग आंतरराष्ट्रीय केंद्र, सरकारटेल यांच्यावतीने बेंगलोरु येथे २८ मार्च रोजी एका समारंभात गोमारे यांना या पुरस्काराने सन्मानित […] The post महादेव गोमारे यांचा राष्ट्रीय स्तरावरील जलयोद्धा पुरस्काराने सन्मान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Mar 2026 1:12 am

चारही सभापतींनी घेतला ‘खुर्चीचा ताबा’

लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषदेत सोमवारी चार विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रीया पिठासीन अधिकारी यांच्या उपस्थितीत रितसर पार पडली. या निवडीनंतर चार पैकी दोन सभापतींना खाते वाटप झाले. तर उर्वरीत दोन सभापतींना व उपाध्यक्षांना आगामी १५ दिवसाच्या आत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी बैठक बोलवून पदभार देणे आवश्यक होते. मात्र उर्वरीत दोन्ही सभापतींनी पुढील सभेच्या १० […] The post चारही सभापतींनी घेतला ‘खुर्चीचा ताबा’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Mar 2026 1:11 am

एफआयआर ते आरोपपत्र सर्वच होणार डिजिटल

मुख्यमंत्र्यांचे निर्देश, ६ महिन्यांची दिली मुदत मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आणि न्यायदानाची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढच्या सहा महिन्यांत एफआयआरपासून चार्जशीटपर्यंतची सर्व प्रक्रिया डिजिटल झाली पाहिजे, असे निर्देश मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत. पोलिस दलाच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. […] The post एफआयआर ते आरोपपत्र सर्वच होणार डिजिटल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Mar 2026 1:08 am

पाकिस्तानवर अविश्वास!

मध्यस्थी नाकारली, इराणने भारतावर दाखविला विश्वास तेहरान : वृत्तसंस्था इराण युद्धात पाकिस्तान स्वत:ला मध्यस्थ देश म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्यात त्याला फारसे यश मिळालेले नाही. पाकिस्तानच्या माध्यमातून इराणला पाठविलेला अमेरिकेच्या १५ अटींचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळून लावला. त्यानंतरही पाकिस्तान निवडक इस्लामी राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक घेऊन पुन्हा मध्यस्थीचा प्रयत्न करीत आहे. परंतु […] The post पाकिस्तानवर अविश्वास! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Mar 2026 1:06 am

डाव्या विचारसरणीमुळे नक्षली चळवळ वाढली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आरोप नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभेत नक्षलमुक्त भारत या विषयावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. देशाला दीर्घकाळापासून नक्षलवादाचा त्रास होता. मात्र, आता त्यातून देशाची मुक्तता झाली आहे. बस्तर विभागातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आला आहे, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. देशातील […] The post डाव्या विचारसरणीमुळे नक्षली चळवळ वाढली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Mar 2026 1:04 am

राजस्थानचा रॉयल विजय

गुवाहाटी : वृत्तसंस्था आयपीएलच्या तिस-या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने पाचवेळचा चॅम्पियन चेन्नई किंग्सचा धुव्वा उडवित नवा इतिहास रचला. नांद्रे बर्गर, जोफ्रा आर्चर आणि रवींद्र जडेजाच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानच्या संघाने चेन्नई सुपर किंग्सला अवघ्या १२७ धावांवर रोखले. या धावसंख्येचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीचे दमदार अर्धशतक आणि सलामीवीर यशस्वी जैयस्वालसह कर्णधार रियान परागच्या फटकेबाजीमुळे अवघ्या १३ […] The post राजस्थानचा रॉयल विजय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Mar 2026 1:02 am

मुंबई महापालिकेला मिळणार पहिल्या महिला आयुक्त!:मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्याची वर्णी, अश्विनी भिडे यांचे नाव निश्चित

देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या (BMC) आयुक्तपदाची धुरा आता पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याच्या खांद्यावर जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू आणि 'मेट्रो वूमन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यमान आयुक्त भूषण गगराणी हे ३१ मार्च रोजी निवृत्त होत असून, त्यांच्या जागी अश्विनी भिडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी सनदी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात मोठी चुरस पाहायला मिळाली. यामध्ये सेवाज्येष्ठतेनुसार मिलिंद म्हैसकर, असीम गुप्ता आणि संजय मुखर्जी यांची नावे चर्चेत होती. मात्र, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहणाऱ्या अश्विनी भिडे यांच्या प्रशासकीय कौशल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास दर्शवल्याचे बोलले जात आहे. सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत भिडे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. शिंदेंचा विरोध मावळला; रात्रीच्या बैठकीत तोडगा सुरुवातीला अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीला नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, सोमवारी रात्री अश्विनी भिडे यांनी स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केली. या भेटीनंतर शिंदे यांचा विरोध मावळला असून प्रशासकीय स्तरावरील सर्व अडथळे दूर झाले असल्याचे समजते. 'मेट्रो वूमन'ची नवी इनिंग १९९५ बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे यांनी मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड (किनारी रस्ता) सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे त्यांना 'मेट्रो वूमन' म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी यापूर्वी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणूनही यशस्वी काम पाहिले आहे. कोस्टल रोड प्रकल्प पूर्णत्वाकडे नेणे आणि पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व मुंबईतील पायाभूत सुविधांचे नियोजन करणे, ही आव्हाने त्यांच्यासमोर असतील. महापालिकेची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका महिला आयुक्ताची नियुक्ती होत आहे. विशेष म्हणजे, सध्या मुंबईच्या महापौरपदीही एका महिला लोकप्रतिनिधी विराजमान आहेत. त्यामुळे आशियातील या सर्वात मोठ्या महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत आणि प्रशासनात आता 'महिला राज' पाहायला मिळणार आहे. गेल्या काही काळापासून महापालिका प्रशासनावर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप धुवून काढून पारदर्शक कारभार करणे, हे अश्विनी भिडे यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान असेल.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 11:31 pm

शिरूर अनंतपाळ नगर पंचायतसमोर विविध मागण्यांसाठी उपोषण

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी शहरातील विविध प्रलंबित प्रश्न व नागरिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने नगर पंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे डॉ. अरविंद भातांब्रे यांनी केले असून, स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. या उपोषणात शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था, निकृष्ट कामे, नगरपंचायतमधील भ्रष्टाचार […] The post शिरूर अनंतपाळ नगर पंचायतसमोर विविध मागण्यांसाठी उपोषण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 11:19 pm

हाडगा येथे आगीत शेतक-याचे २० लाखांचे नुकसान

निलंगा : प्रतिनिधी सोयाबीनसह इतर शेतीउपयोगी साहित्य ठेवलेल्या गोडाऊनमध्ये शॉटसर्कीट होऊन लागलेल्या आगीत हाडगा येथील शेतकरी सर्जेराव मोरे यांचे साधारणत: २० लाखांचे नुकसान झाल्याची घटना दि २८ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. निलंगा तालुक्यातील हाडगा येथील शेतकरी सर्जेराव मोरे यांच्या शेतातील गोडाऊनला शॉटसर्किट होऊन आचानक आग लागली. आग लागल्याचे सर्जेराव मोरे यांना लक्षात येताच […] The post हाडगा येथे आगीत शेतक-याचे २० लाखांचे नुकसान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 11:17 pm

जळकोट येथे तापमान वाढल्याने कुलरच्या विक्रीत वाढ

जळकोट : प्रतिनिधी सध्या सूर्य आग ओकत आहे. जळकोट तालुक्याचे तापमान ३७ अंश सेल्सीअसवर गेले आहे. दुपारच्या सुमारास उकाडा वाढत आहे, अशा परिस्थितीत अंगाची लाही लाही होत आहे. या तापमानापासून बचाव करण्यासाठी नागरीक कुलरचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच अनेक नागरिकांनी आपले अडगळीला पडलेले कूलर बाहेर काढून दुरुस्तीच्या दुकानांमध्ये घेऊन येत आहेत. […] The post जळकोट येथे तापमान वाढल्याने कुलरच्या विक्रीत वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 11:16 pm

शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता:मुंगी घाटातून कावडींचा चित्तथरारक प्रवास, 'म्हाद्या धाव... म्हाद्या पाव!'चा परिसरात जयघोष

सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या यात्रेची सोमवारी सांगता झाली. 'म्हाद्या धाव... म्हाद्या पाव... हर हर महादेव!' अशा गगनभेदी जयघोषात आणि हजारो भाविकांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील शिवभक्तांनी आणलेल्या कावडीतील पवित्र जलाने मंदिरातील शिवलिंगावर जलाभिषेक करण्यात आला. अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून कावडी चढवण्याचा थरार डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील महादेवाच्या डोंगराचा हा शेवटचा टप्पा अत्यंत उंच आणि दुर्गम आहे. या डोंगरातील 'मुंगी घाट' चढणे हे मोठे आव्हान असते. पुरंदर तालुक्यातील सासवड, बेलसर, शिवरी, मावळ आणि एकच पूर भागातून मोठ्या संख्येने भाविक नीरा आणि कऱ्हा नदीसह पंचनद्यांचे पाणी घेऊन कावडींसह दाखल झाले होते. संत तेली भुतोजी बुवा (उर्फ तेल्या भुत्या), निवृत्ती महाराज हळदकर आणि काशिनाथ कावडे यांच्या 'मानाची कावड' मुंगी घाटातून वर आणताना भाविकांची मोठी ओढाताण झाली, मात्र ईश्वरी भक्तीच्या जोरावर हा जोखमीचा प्रवास यशस्वी झाला. डोंगराच्या उतारावर बसलेले हजारो भाविक हा थरार आपल्या डोळ्यांत साठवून घेत होते. गुढीपाडव्यापासून सुरू झाला होता सोहळा शिखर शिंगणापूरची ही यात्रा गुढीपाडव्याला गुढी उभारून उत्साहात सुरू झाली होती. या कालावधीत हळदीचे धार्मिक कार्यक्रम पार पडले. एकादशीच्या दिवशी इंदूरचे काळगावडे राजे यांनी मंदिरात शिव-पार्वतीचे दर्शन घेतले. त्यानंतर खऱ्या अर्थाने मुंगी घाटातून कावडी चढवण्याच्या मुख्य विधीला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत या कावडी घाटाच्या वर पोहोचत होत्या. पंचनद्यांच्या जलाने अभिषेक कष्टप्रद मार्ग पार करून मंदिर परिसरात पोहोचलेल्या या कावडींमधील पाण्याने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला. नीरा आणि कऱ्हा नदीच्या पवित्र जलाने महादेवाला न्हाऊ घालण्यात आले. यात्रेच्या सांगतेवेळी संपूर्ण मंदिर परिसर आणि डोंगररांगा भाविकांच्या गर्दीने आणि 'हर हर महादेव'च्या घोषणांनी दणाणून गेल्या होत्या. या सोहळ्याने भाविकांच्या श्रद्धेचा आणि साहसाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 11:06 pm

पिंपरी-चिंचवड पालिकेला जगात कोणी ओळखत नाही!:आयुक्त विजय सूर्यवंशींचे विधान; शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी शहराच्या जागतिक ओळखीबद्दल केलेल्या एका विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची जगभर ओळख आहे, मात्र पीसीएमसीला जगात कोणी ओळखत नाही, असे विधान आयुक्तांनी एका पत्रकार परिषदेत केले. आशियातील प्रगत औद्योगिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराची जागतिक प्रतिमा नाकारल्याने नागरिक, राजकीय नेते आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ आणि अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'गंधर्व मंच' संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त २ एप्रिल ते ७ जून दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्तांनी गंधर्व महाविद्यालयाच्या कार्याचे कौतुक केले. मात्र, हे कौतुक करताना त्यांनी महापालिकेच्या (पिंपरी-चिंचवड शहर) जागतिक अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. नेमके काय म्हणाले आयुक्त? पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी गंधर्व महाविद्यालयाच्या जागतिक व्यापाचे कौतुक केले. मात्र, हे कौतुक करताना त्यांनी पिंपरी-चिंचवड शहराची तुलना अत्यंत नकारात्मक पद्धतीने केली. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाला संपूर्ण जगात ओळखले जाते, पण पीसीएमसीला जगात कोणीच ओळखत नाही, असे विधान त्यांनी केले. एका जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्याने शहराच्या जागतिक ओळखीबद्दल असे विधान केल्याने उपस्थित सर्वच जण अवाक झाले. पत्रकारांचा जागीच आक्षेप आयुक्तांच्या या विधानावर उपस्थित पत्रकारांनी तातडीने आक्षेप नोंदवला. पिंपरी-चिंचवड हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर आशियातील एक प्रमुख ऑटोमोबाईल आणि आयटी हब (IT Hub) म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. अशा प्रगत शहराच्या प्रतिमेला धक्का लावणारे वक्तव्य जबाबदार पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने करणे चुकीचे असल्याचे पत्रकारांनी स्पष्ट केले. या वादामुळे पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश बाजूला राहून आयुक्तांच्या विधानाचीच चर्चा अधिक रंगली. शहराच्या अस्मितेचा प्रश्न पिंपरी-चिंचवड शहराने उद्योग, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. 'फोक्सवगन', 'टाटा मोटर्स', 'मर्सिडीज बेंझ' यांसारख्या जागतिक कंपन्यांमुळे हे शहर जगाच्या नकाशावर ठळकपणे ओळखले जाते. असे असताना आयुक्तांनी शहराला कोणी ओळखत नाही असे म्हणणे, हा शहराच्या अस्मितेचा अपमान असल्याची भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. राजकीय वर्तुळात पडसाद उमटण्याची शक्यता या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. महापालिका आयुक्तांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी किंवा स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. आगामी काळात या मुद्द्यावरून आंदोलने किंवा राजकीय टीकास्र सोडले जाण्याची दाट शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 10:54 pm

सातारा जिल्ह्यात गारांचा पाऊस:वीज पडून 25 शेळ्या, एका महिलेचा मृत्यू; शेती पिके आणि वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान

सातारा शहरासह परिसरात सोमवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन सायंकाळच्या सुमारास गारांसह पावसाच्या सरी कोसळल्या. हलक्या ते मध्यम वाऱ्यासह झालेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. तसेच शहर व परिसरात बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांसह व्यावसायिकांची तारांबळ उडाली.सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील मौजे कराडवाडी गावामध्ये सोनाली अजित कराडे (वय 29) या महिलेच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. काही काळासाठी शहरातील वाहतूकही विस्कळित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. गारांच्या सरीमुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी या पावसाने दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेती पिकांना फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विशेषत: काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगितले जात आहे. तसेच जिल्ह्यातील वीटभट्टी व्यावसायिकांनाही सोमवारच्या पावसाचा मोठा फटका बसला असून तयार वीट भिजल्याने वीट व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी व व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मोर्वे (ता. खंडाळा) येथील सोलाडी शिवार नावाच्या परिसरात वीज कोसळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत शेतकरी अमोल गोपाळ धायगुडे यांच्या ८ शेळ्यांचा मृत्यू झाला असून १ मेंढी गंभीर जखमी झाली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासनाकडून पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 10:04 pm

नक्षलवाद विरोधी पथकातील ६० पोलिसांना विशेष पदक

मुंबई : प्रतिनिधी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात माओवाद संपवण्यासाठी नक्षलवाद्यांशी लढणा-या सी-६० तुकडीमध्ये ३ वर्षे सेवा करर्णाया पोलिसांना विशेष पदक देऊन गौरवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली. तसेच बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी डेटा-आधारित टूल विकसित केली जाणार असून यासाठी मुंबई आयआयटीचे सहकार्य घेतले जात आहे. या टूलची चाचणी पूर्ण झाल्यानंतर ते […] The post नक्षलवाद विरोधी पथकातील ६० पोलिसांना विशेष पदक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 9:59 pm

भोंदू अशोक खरात 'सिद्धपुरुष' अन् 'ब्रह्मांडशास्त्रज्ञ':नामकर्ण आवारेंच्या आत्मचरित्रात धक्कादायक दावे, पुस्तकातील पाने व्हायरल

अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि बड्या राजकीय नेत्यांशी असलेल्या संबंधांमुळे चर्चेत आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या दाव्यानंतर, सिन्नर औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे आणि खरात यांच्यातील घनिष्ठ संबंधांचे पुरावे समोर आले आहेत. आवारे यांच्या 'असा मी नामकर्ण' या आत्मचरित्रात खरातचा उल्लेख चक्क 'सिद्धपुरुष' आणि 'ब्रह्मांडशास्त्रज्ञ' असा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. नामकर्ण आवारे यांनी २०१२ साली प्रकाशित केलेल्या ‘असा मी नामकर्ण’ या आत्मचरित्रात अशोक खरात हा 'ब्रह्मांडशास्त्र तज्ज्ञ' असल्याचा दावा करण्यात आला असून, त्याने फ्रान्समधील नामांकित सोबॉर्न (Sorbonne) विद्यापीठातून 'ओशिनोलॉजी' (समुद्रशास्त्र) या विषयात सुवर्णपदकासह पदवी मिळवल्याचा अजब गौप्यस्फोट करण्यात आला आहे. बीएससीनंतर त्याने लष्करी शिक्षण घेतले आणि त्यानंतर तो या शास्त्रात पारंगत झाल्याचे पुस्तकात नमूद आहे. विशेष म्हणजे या पुस्तकाची प्रस्तावनाच मुळी अशोक खरात याने लिहिली आहे. सिद्ध पुरुषाच्या सहवासात पुस्तकातील पान क्रमांक १८२ ते १९४ दरम्यान ‘सिद्ध पुरुषाच्या सहवासात’ या स्वतंत्र प्रकरणात नामकर्ण आवारे यांनी खरातवर स्तुतिसुमने उधळली आहेत. खरातने केलेली भाकिते वेळेत आणि शंभर टक्के खरी ठरतात, त्यामुळे ती व्यक्ती सर्वसामान्य नसून सिद्धपुरुष असल्याची खात्री पटल्याचा उल्लेख पान क्र. १८६ आणि १८७ वर आढळतो. इतकेच नव्हे, तर खरातच्या सूचनेनुसारच 'श्री शिवनिका संस्थान'ची स्थापना आणि ईशानेश्वर मंदिराची निर्मिती गुरुदक्षिणा म्हणून केल्याचेही आवारे यांनी लिहून ठेवले आहे. राजकीय लागेबांधे आणि 'पाद्यपूजा' सुषमा अंधारे यांनी यापूर्वीच अशोक खरात, नामकर्ण आवारे आणि शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांचे एकत्र फोटो प्रसिद्ध केले आहेत. या साखळीत 'जगदंब पतसंस्थे'च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार आणि 'ब्लॅक मनी' पांढरा करण्याचा उद्योग सुरू असल्याचा संशय अंधारे यांनी व्यक्त केला आहे. रूपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केली तेव्हाही नामकर्ण आवारे तेथे उपस्थित असल्याचा दावा अंधारे यांनी केला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. नामकर्ण आवारे यांचे स्पष्टीकरण या आरोपांवर स्पष्टीकरण देताना नामकर्ण आवारे म्हणाले की, दीपक केसरकर आमच्या संस्थेत आले होते आणि संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचा सत्कार केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत खरात होते. खरात हे आमच्या संस्थेचे सभासद नाहीत किंवा आमचे कोणतेही आर्थिक व्यवहार नाहीत. मात्र, त्यांच्याच आत्मचरित्रात खरातविषयी असलेल्या आदरामुळे आणि वर्णनामुळे आवारेंचे हे स्पष्टीकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 9:55 pm

चेन्नईचे राजस्थानला केवळ १२८ धावांचे लक्ष्य

गुवाहाटी : चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या १९ व्या मोसमातील आपल्या पहिल्याच आणि स्पर्धेतील एकूण तिस-या सामन्यात ढेर झाली आहे. सीएसकेला राजस्थान विरुद्ध पूर्ण २० ओव्हरही खेळता आले नाही. राजस्थानच्या गोलंदाजांसमोर सीएसकेच्या फक्त तिघांनाचा दुहेरी आकडा गाठता आला. त्यातही जेमी ओव्हरटन या एकट्या फलंदाजाने २० पार मजल मारली. त्यामुळे सीएसकेला राजस्थानसमोर सन्मानजनक आव्हान ठेवता आले. राजस्थानने […] The post चेन्नईचे राजस्थानला केवळ १२८ धावांचे लक्ष्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 9:51 pm

सातारा-लातुर महामार्गाबाबत मंत्री जयकुमार गोरे आक्रमक:धुळदेव, चिमणगावसह इतर ठिकाणच्या अपूर्ण कामांबाबत दिला अल्टिमेटम

राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी आणि ५४८ ई सातारा ते लातूर आणि सातारा ते पंढरपूर या रस्त्याच्या सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या अपूर्ण कामांबाबत ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे कमालीचे आक्रमक झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी माण तालुक्यातील धुळदेवसह गोंदवले, दिवड, पळशी, चिमणगाव येथील अपघातांचे ब्लॅक स्पॉट्स अधोरेखीत करुन त्वरित अपूर्ण कामे पूर्ण करण्यासंदर्भात रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिला. सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मा. जिल्हा परिषद सदस्य, श्री सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे (आबा), सातारा जिल्हा भाजपचे निवडणूक प्रभारी धैर्यशीलदादा कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता आणि अधिकारी उपस्थित होते. सातारा - पंढरपूर - लातूर राष्ट्रीय महामार्गाचे सातारा जिल्ह्यातील काम अनेक ठिकाणी अपूर्ण असल्याने असंख्य अपघात होत आहेत. अपघातात अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. नुकताच धुळदेव येथे भीषण अपघात होवून दोन जणांचा मृत्यू झाला होता. याच ठिकाणी आत्तापर्यंत ५० पेक्षा जास्त अपघात होवून १५ जणाचा मृत्यू झाला आहे तर ६० पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले असल्याचे ना. जयकुमार गोरे यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. दिवड गावच्या हद्दीत पूलाचे अर्धवट काम पूर्ण होईपर्यंत डांबरीकरण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. पळशी येथेही ५० मीटर लांबीच्या अपूर्ण रस्त्यावर तात्पुरते डांबरीकरण करणे, गोंदवले येथील नियमापेक्षा अधिक ऊंच केलेले गतीरोधक काढून योग्य निकषाप्रमाणे गतीरोधक करण्याच्या सुचना मंत्री गोरे यांनी दिल्या. कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील ३० मीटर लांबीचा ब्लॅक स्पॉट अडचणीचा ठरत असल्याने तेथे डांबरीकरण करणे आणि पिलीव ते पंढरपूर दरम्यान ज्या ठिकाणी महामार्गाचे काम अपूर्ण आहे तिथे डांबरीकरण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. बैठकीत आवश्यक त्या ठिकाणी आठवड्यात डांबरीकरण, पर्यायी वळण मार्ग करण्याचे निर्णय घेण्यात आले. धुळदेव येथील रस्ता आणि पळशी येथील पूलाचे काम डिसेंबर अखेर मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 9:17 pm

केळीचे १००० कंटेनर इराणमध्ये अडकले

मुंबई : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतक-यांना बसताना दिसत आहे. जेएनपीए बंदरातून इराणकडे पाठवलेले जवळपास ८०० ते १ हजार केळीचे कंटेनर तिथेच अडकून पडले असल्याचे चित्र आहे. त्याचवेळी युद्धाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणा-या शिपिंग कंपन्यांच्या मनमानीमुळे शेतकरी आणि निर्यातदार देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात गल्फ […] The post केळीचे १००० कंटेनर इराणमध्ये अडकले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 8:58 pm

भारतात संशोधनाची वाट बिकट:वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे मोठे आव्हान, ज्येष्ठ पशुवैज्ञानिक डॉ. दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर

भारतात विविध क्षेत्रात संशोधन करण्यासाठी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. अजुनही आपण वैज्ञानिक दृष्टीकोन रूजवु शकलो नाही. असे परखड प्रतिपादन १२ वा गोविंद सन्मान स्विकारताना ज्येष्ठ पशुवैज्ञानिक डॉ. दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर यांनी मांडले. परदेशांत विज्ञान विषयक काम करणार्‍या मोठमोठ्या प्रयोगशाळा असून तिथे जगभरांतील शास्त्रज्ञ अभ्यासकांना सन्मानाने बोलावले जाते. पण आपल्याकडे हे होताना दिसत नाही. भोपाळच्या संशोधन संस्थेत मी मुख्य शास्त्रज्ञ संशोधक दीर्घकाळ १४ वर्ष काम केले. पण अशा संस्था भारतात फार थोड्या आहेत.' आपल्या संशोधन कामाचा परिचय, त्याची व्याप्ती त्याचा कोरोना काळात दिसलेला प्रभाव त्यांनी श्रोत्यांना समजावुन दिला. गरूड परिवाराच्या वतीने गेल्या १९ वर्षांपासुन कै. गोविंद देशपांडे स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. गेली १२ वर्षे मराठवाड्यातील विविध क्षेत्रात महत्वाची कामगिरी बजावणार्‍या व्यक्तीस हा सन्मान प्रदान करण्यात येतो. यावर्षी हा सन्मान ज्येष्ठ पशुवैज्ञानिक डॉ. दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर यांना डॉ. के.डी देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या निमित्ताने आपलं डोकं चालतं कसं? या विषयावर प्रा.रविशंकर झिंगरे यांनी दृकश्राव्य व्याख्यान दिले. मानवी मेंदुसमोर कृत्रिम बुद्धीमत्तेचे (AI) मोठे आव्हान आहे. अजुनही त्याच्या व्याप्तीची पुर्ण कल्पना आपल्याला माहित नाही. पण या क्रांतीने मानवी समुहाचे बौद्धीक कष्ट कमी होतील हे नक्की. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचालन श्रीकांत उमरीकर यांनी केले तर आभार प्राची शिंदे हिने मानले. पाहुण्यांचे स्वागत माधुरी गौतम, नामदेव शिंदे, धनंजय दंडवते व अनिल पाटील यांनी केले. या प्रसंगी शहरांतील प्रतिष्ठित नागरीक, विज्ञान प्रेमी, वृत्तपत्र क्षेत्रांतील नामांकीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 8:32 pm

११ व १२ एप्रिलला सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन

लातूर : प्रतिनिधी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दि. ११ व १२ एप्रिल २०२६ रोजी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे सहाव्या राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले यांनी सोमवारी लातुरात पत्रकार परिषदेत दिली. होळकर वाडा या ठिकाणी होणा-या या संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर […] The post ११ व १२ एप्रिलला सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 8:24 pm

रीड लातूरतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण

लातूर : प्रतिनिधी तालुक्यातील निवळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दि. २५ मार्च रोजी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या ऑल इंडिया सैनिकी स्कूल आणि नवोदयसाठी पात्र झालेले विद्यार्थ्यांचा सत्कार व रीड लातूरतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. ऑल इंडिया सैनिकी स्कूल आणि नवोदयसाठी पात्र झालेला अविर अण्णासाहेब शिंदे व विशेष प्राविण्य मिळवलेले […] The post रीड लातूरतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 8:23 pm

निवडणूक संपली, राजकारण संपले; आता फक्त ‘विकासकारण’

लातूर : प्रतिनिधी निवडणुका झाल्या की राजकारण संपले पाहिजे आणि विकासाचे राजकारण सुरू झाले पाहिजे, हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून लातूर जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीत काँग्रेस पक्षाने एक अत्यंत प्रगल्भ आणि विधायक पाऊल उचलले आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण हितासाठी आणि प्रशासकीय कामात समन्वय राहावा, या उद्देशाने काँग्रेसने सभापती पदासाठी दाखल केलेले आपले सर्व उमेदवारी अर्ज […] The post निवडणूक संपली, राजकारण संपले; आता फक्त ‘विकासकारण’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 8:22 pm

मनपा प्रशासनाने ‘स्थायी’कडे सादर केला अर्थसंकल्प 

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या बाबी अत्यंत मर्यादीत स्वरुपाच्या असून ही परिस्थिती व वस्तुस्थिती समोर ठेऊन महापालिका प्रशासनाने दि. ३० मार्च रोजी २०२५-२६ चे सुधारीत व २०२६-२७ चे मुळ अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले. आता येत्या सहा दिवसांत स्थायी समितीचे सदस्य या अंदाजपत्रकावर सूचना, दुरुस्त्या लेखी स्वरुपात देतील आणि त्यानंतर महापालिकेच्या अर्थसंकल्पास अंतीम […] The post मनपा प्रशासनाने ‘स्थायी’कडे सादर केला अर्थसंकल्प appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 8:21 pm

हिंगोली सीईओ विवेक गायकवाडांना उत्कृष्ठ सेवाकर्मी पुरस्कार:अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून जिल्हा परिषदेत जंगी सत्कार सत्कार

हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना शासनाचा उत्कृष्ठ सेवाकर्मी पुरस्कार मिळाल्याबद्दल सोमवारी ता ३० जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सत्कार केला. राज्य शासनाच्या 150 दिवस कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते हिंगोली जिल्हा परिषदेचे सीईओ विवेक गायकवाड यांना शनिवारी मुंबई येथे विशेष कार्यक्रमात सेवाकर्मी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे. हिंगोली सारख्या लहान जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा परिषदेचे कौतुक केले. त्यानंतर आज हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त सीईओ डॉ. सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, केशव गड्डापोड, विजय बोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, समाज कल्याण अधिकारी गीता गुट्टे, जलसंधारण अधिकारी प्रियंका राजपूत, शिक्षणाधिकारी आसावरी काळे, संदीप सोनटक्के, राजू नरवाडे, ठोंबरे, केंद्रे, पी. व्ही. घंटाराम, प्रफुल्ल खंदारे, विवेक दळवी, सिद्दीकी, नंदकिशोर परिहार, संदीप अन्नदाते, अनिकेत सोनटके, गिरीराज बोथीकर, उदय देशपांडे, सुरेखा जारवाल, एम. डी. पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच जिल्हा परिषदेला यश मिळविता आले आहे. यापुढेही सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करून जिल्हा परिषदेचे कामकाज अधिक गतिमान करावे असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय नागरिकांच्या तक्रारींची तातडीने सोडवणूक करण्याच्या सूचनाही त्यांनी विभागांना दिल्या.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 7:10 pm

आमदार वडिलांच्या मदतीला लेक आली धावून:विजय शिवतारे यांना कन्या डॉ. ममता यांनी दिली किडनी; मुंबईत पार पडली यशस्वी शस्त्रक्रिया

मुलगी आणि वडिलांचे नाते हे जगातील सर्वात हळवे नाते असते, याची प्रचिती देणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. पुरंदरचे आमदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय शिवतारे यांना त्यांची कन्या डॉ. ममता शिवतारे यांनी स्वतःची किडनी दान करून नवजीवन दिले आहे. मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आज यशस्वीरित्या पार पडली असून, सध्या पिता-कन्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, गेल्या काही काळापासून आमदार विजय शिवतारे हे किडनीच्या विकाराने त्रस्त होते. त्यांचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांना नियमित डायलिसिसवर राहावे लागत होते आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. अशा कठीण प्रसंगी त्यांची कन्या डॉ. ममता शिवतारे या वडिलांच्या आयुष्यात 'देवदूत' बनून पुढे आल्या. केवळ एक कर्तव्यदक्ष मुलगीच नव्हे, तर एक डॉक्टर म्हणूनही त्यांनी वडिलांना या संकटातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. लेकीच्या कर्तव्याची चर्चा वडिलांच्या जीवनासाठी स्वतःची किडनी देण्याच्या ममता यांच्या या निर्णयाने अवघा महाराष्ट्र भारावून गेला आहे. आईपेक्षा लेकीचा बापावर जास्त जीव असतो, हे वाक्य ममता यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. पुरंदर तालुक्यासह संपूर्ण राज राजकीय वर्तुळात या बाप-लेकीच्या नात्याची आणि डॉ. ममता यांच्या त्यागाची मोठी चर्चा होत आहे. एका लेकीने वडिलांना दिलेली ही जीवनाची भेट अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विजय शिवतारे यांचा थोडक्यात परिचय विजय शिवतारे हे 'बापू' या नावाने प्रसिद्ध असून ते पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. त्यांनी २००९ आणि २०१४ मध्ये सलग दोनदा विजय मिळवला होता. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला, तरी २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा जोरदार मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली. यापूर्वी त्यांनी राज्य मंत्रिमंडळात जलसंपदा राज्यमंत्री म्हणूनही यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव ते काही काळ सक्रिय राजकारणापासून दूर होते, मात्र आता यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ते पुन्हा जोमाने जनसेवेत उतरतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 6:58 pm

महाराष्ट्र माओवादमुक्त करण्यात पोलिसांना मोठे यश!:माओवाद्यांशी लढणाऱ्या सी-60 जवानांना विशेष पदक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील पोलिस दलाला तंत्रज्ञानाने अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. गुन्हेगारी तपासात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, पुढील सहा महिन्यांत एफआयआरपासून ते चार्जशीटपर्यंतची सर्व प्रक्रिया पूर्णपणे 'डिजिटाइज' करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच, गडचिरोलीत माओवादाचा बीमोड करणाऱ्या सी-६० दलातील जवानांसाठी त्यांनी विशेष पदक जाहीर केले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने राज्यांच्या तांत्रिक प्रगतीसाठी १०६ मुद्दे दिले होते, ज्यांचे पालन करण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. आता आपण पुराव्यांच्या व्यवस्थापनासाठी 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत, ज्यामुळे पुराव्यांमध्ये छेडछाड करणे अशक्य होईल. ही यंत्रणा सर्व पोलिस ठाण्यांमध्ये सहा महिन्यांत कार्यान्वित करण्याच्या सूचना पोलिस महासंचालकांना दिल्या आहेत. माओवादमुक्ती आणि सी-६० जवानांचा गौरव महाराष्ट्रात माओवाद आता जवळपास संपुष्टात आला आहे. ही लढाई लढताना आमच्या २४४ पोलिसांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाची दखल घेत आणि हे कठीण काम करणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी, ज्यांनी सी-६० फोर्समध्ये किमान ३ वर्षे सेवा बजावली आहे, त्या सर्वांना 'सी-६० मेडल' देऊन सन्मानित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी अभिमानाने नमूद केले. अपराधसिद्धीचा दर ९५ टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य राज्यातील गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण (Conviction Rate) वाढवण्यासाठी सरकार आग्रही आहे. सद्यस्थितीत हा दर ५० टक्क्यांच्या आसपास असून तो ९५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी गेल्या ४ ते ५ वर्षांतील प्रकरणांचे 'एआय'च्या माध्यमातून विश्लेषण करण्याचे काम सीआयडीला (CID) सोपवण्यात आले आहे. विशेषतः सेशन्स कोर्टातील निकालांमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष रणनीती आखली जात आहे. अंमली पदार्थांविरोधात 'ड्रग्ज फ्री कॅम्पस' मोहीम राज्यातील तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी 'ड्रग्ज फ्री कॅम्पस' ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध आणि विक्रीविरुद्ध महाराष्ट्रात लवकरच एक मोठी लढाई पुकारली जाईल. यासाठी पोलिस महासंचालक लवकरच एक सविस्तर रणनीती आणि सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार आहेत. अपघात रोखण्यासाठी 'नागपूर मॉडेल'चा विस्तार रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. नागपूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या एका मॉडेलमुळे तेथील अपघातांत ३० टक्क्यांनी घट झाली आहे. हेच मॉडेल आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील यशस्वी प्रयोगांच्या धर्तीवर संपूर्ण राज्यात अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 6:31 pm

‘यूपीआय’ व्यवहारासाठी शुल्क आकारण्याची शिफारस

नवी दिल्ली : तुम्ही जर ‘यूपीआय’द्वारे आर्थिक व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमची झोप उडवणारी आहे. कारण, आता प्रत्येक ‘यूपीआय’ व्यवहारावर शुल्क लादण्याची शक्यता आहे. एका संसदीय समितीने ‘यूपीआय’ नेटवर्कच्या देखभालीचा वाढता खर्च पाहता, त्यावर आधारित व्यवहारांसाठी ‘टियर्ड रेवेन्यू मॉडेल’ म्हणजेच शुल्क लागू करण्याची शिफारस केली आहे. या निर्णयामुळे डिजिटल पेमेंट क्षेत्रातील फ्री-फॉर-ऑल धोरणाला […] The post ‘यूपीआय’ व्यवहारासाठी शुल्क आकारण्याची शिफारस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 6:23 pm

नितीश कुमारांचा आमदारकीचा राजीनामा

पाटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज अखेर विधान परिषद सदस्य (एमएलसी) पदाचा राजीनामा दिला आहे. नुकतेच ते राज्यसभेवर निवडून गेले, ज्यामुळे नियमानुसार त्यांना आमदारकी सोडणे आवश्यक होते. विशेष म्हणजे, राजीनामा देऊनही ते पुढील काही दिवस मुख्यमंत्री पदावर कायम राहणार आहेत. अशा परिस्थितीत, बिहारचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितीश […] The post नितीश कुमारांचा आमदारकीचा राजीनामा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 6:20 pm

विरोधकांच्या दुकानातील माल संपलाय:आदित्य ठाकरे-मोहित कंबोज भेटीवरून नितेश राणेंची सडकून टीका, काय म्हणाले राणे?

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला हजेरी लावली. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाठराखण करताना म्हटले की एखाद्या शुभकार्याला बोलावले तर जाणे चुकीचे नाही. आता यावर भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत आदित्य ठाकरेंच्या हजेरीवर बोलताना नितेश राणे म्हणाले, शेवटी विरोधकांकडे आता पर्याय राहिलेला नाही. सगळेच भांडवल संपलेले आहे. दुकानामध्ये माल संपलेला आहे. भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दूसरा पर्यायच राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीसच आपला बॉस हे त्यांनी जाहीर करावे पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, आम्ही नेहमी म्हणायचो की आमचा बॉस हा सागर बंगल्यावर बसतो, आता वर्षा बंगल्यावर आहे. आता हळू हळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत. आणि त्यांनी जेवढ्या लवकर जो जो मार्ग स्वीकारला आहे तो लवकर स्वीकारावा आणि आमचाही बॉस देवेंद्र फडणवीस आहेत हे जाहीर करावे. संजय राऊतांकडून पाठराखण खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, एखाद्याच्या मुलीच्या वाढदिवसासारख्या शुभकार्याला जाणे चुकीचे नाही. हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता, तर एक कौटुंबिक समारंभ होता. अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे ही केवळ सामाजिक परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले. जर कुणी शुभकार्याला निमंत्रण दिले, तर तेवढ्यापुरती कटुता बाजूला ठेवून जाणे ही आपली संस्कृती आहे. अशा गोष्टींवरून प्रश्न उपस्थित करणे किंवा बातम्या बनवणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले. अनेकदा विरोधकांच्या घरीही आपण गेलेलो आहोत, असे सांगत त्यांनी उदाहरण दिले की, बाळासाहेब ठाकरेही अशा कार्यक्रमांना जात असत आणि शरद पवारही जातात. मात्र, या भेटी केवळ त्या क्षणापुरत्याच मर्यादित असतात, वैचारिक मतभेद मात्र कायम राहतात, असे त्यांनी नमूद केले. सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. लोकशाही व्यवस्थेत कोण कोणाला भेटायचे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. या भेटीवरून अनावश्यक वाद निर्माण करू नये. राजकारण आणि कौटुंबिक कार्यक्रम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या मुलीच्या वाढदिवसासारख्या आनंदाच्या प्रसंगी उपस्थित राहण्यात काहीच गैर नाही. आम्ही कधीच विरोधकांना शत्रू मानले नाही. राजकीय मतभेद असूनही सामाजिक नातेसंबंध टिकवणे हीच खरी लोकशाही संस्कृती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 5:51 pm

ऐन लग्नसराईत चांदीच्या दरात मोठी घसरण;  सोन्याचा दर १.४६ लाखांवर

जळगाव : प्रतिनिधी शहरातील सुवर्ण बाजारपेठेत अनेक दिवसांपासून सोनं, चांदीच्या दरात मोठी चढ-उतार होत असून, लग्नसराई तसेच सणासुदीसाठी दागिने खरेदीच्या विचारात असलेले ग्राहक संभ्रमात पडले आहेत. सोनं आणि चांदीचे दर जोपर्यंत स्थिर होत नाही, तोपर्यंत बाजारपेठेतील उलाढाल सुरळीत होण्याची चिन्हे नसल्याने सुवर्ण व्यावसायिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज जळगावच्या बाजारात सोन्याचे दर १,४६,५०० रुपयांवर जाऊन […] The post ऐन लग्नसराईत चांदीच्या दरात मोठी घसरण; सोन्याचा दर १.४६ लाखांवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 5:44 pm

वडिलांच्या धुम्रपानामुळे मुलांना ‘टाईप २’ चा मधुमेह?

सॅक्रामेन्टो : धूम्रपान आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. याचा परिणाम धूम्रपान करणारा आणि ज्या व्यक्तीसमोर धूम्रपान केला जात आहे त्या दोघांच्या आरोग्यावर होतो, परंतु आता एका नवीन अभ्यासातून असे समोर आले आहे की वडिलांच्या धूम्रपान करण्याच्या सवयीचा परिणाम केवळ त्यांच्या आरोग्यावरच नाही तर मुलांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. संशोधनानुसार, जर वडील धूम्रपान करतात तर यामुळे त्यांच्या मुलामध्ये […] The post वडिलांच्या धुम्रपानामुळे मुलांना ‘टाईप २’ चा मधुमेह? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 5:41 pm

काँग्रेस-एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी

अकोला : प्रतिनिधी अकोला महापालिका निवडणुकीपासून काँग्रेस आणि ‘एमआयएम’च्या नगरसेवकांमध्ये सुरू झालेला राजकीय राड्याने आता उग्र रूप धारण केले आहे. अकोला शहरातील अकोट फैल भागात दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये किरकोळ वादातून, समर्थकांमध्ये तुफान दंगल झाली. हाणामारी, दगडफेक, धारदार शस्त्रांनी एकमेकांवर वार झाले. पाच जण गंभीर जखमी झाले असून, यातील एकावर धारदार चाकूने वार झाला आहे. चाकूने […] The post काँग्रेस-एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 5:41 pm

महाराष्ट्रात खरात प्रकरणाची पुनरावृत्ती; ४० महिलांचे लैंगिक शोषण

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हादरवणारे प्रकरण समोर आले असून नवी मुंबईत एका भामट्याने तब्बल ४० महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर हे दुसरे मोठे प्रकरण असल्याने राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आदर्श म्हात्रे (वय ३५) असे या आरोपीचे नाव असून तो स्वत:ला कधी […] The post महाराष्ट्रात खरात प्रकरणाची पुनरावृत्ती; ४० महिलांचे लैंगिक शोषण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 5:37 pm

‘पीएनजी’साठी अर्ज न केल्यास गॅस सिलिंडर कनेक्शन होणार बंद

मुंबई : प्रतिनिधी आखातात सुरू झालेल्या युद्धामुळे भारत देश चांगलाच होरपळत आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उर्जासंकट निर्माण झाले आहे. नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाची भारतात मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळेच गॅस सिलिंडरची किंमत वाढली आहे. गॅस बुक करूनही लोकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नाही. त्यामुळेच आता महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पीएनजी कनेक्शन घेणे शक्य आहे, […] The post ‘पीएनजी’साठी अर्ज न केल्यास गॅस सिलिंडर कनेक्शन होणार बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 5:33 pm

गडचिरोलीतील जमिनी बळकावण्याचे भाजपचे षडयंत्र:शेतकऱ्यांची सुपीक जमीन उद्योगांच्या घशात घालू देणार नाही, काँग्रेसचा इशारा

गडचिरोली जिल्ह्यात उद्योगांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावण्याचे मोठे षडयंत्र सुरू असून, यामध्ये सत्ताधारी भाजपशी संबंधित नेत्यांची भागीदारी असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय एक इंचही जमीन अधिग्रहित करू देणार नाही; जर बळजबरी केली तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात जेएसडब्ल्यू (JSW) प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहणावरून सध्या जिल्ह्यात रणकंदन माजले आहे. विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणातील भयावहता मांडताना सांगितले की, चामोर्शी तालुक्यातील १४ गावांमधील सुपीक जमीन सध्या अधिग्रहित केली जात आहे. आगामी काळात आणखी ३३ गावे या प्रक्रियेत ओढली जाणार असून, यामुळे सुमारे ५० गावे ओसाड पडण्याची आणि हजारो शेतकरी भूमिहीन होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी उद्योगांच्या घशात घालून त्यांना देशोधडीला लावण्याचे हे कारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. सभागृहात उमटले पडसाद, अभिजित वंजारी आक्रमक भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीसाठी देण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. हा प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी वडेट्टीवार यांनी विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. या पत्राची दखल घेत आमदार वंजारी यांनी विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका आणि भेंडाळा परिसरातील सुपीक जमिनीचे अधिग्रहण तातडीने थांबवा, अशी मागणी त्यांनी सभागृहात लावून धरली. शेतकऱ्यांचे 'मुंडन' आंदोलन आणि संताप जेएसडब्ल्यू (JSW) प्रकल्पासाठी जमिनी अधिग्रहित करण्याच्या हालचाली सुरू होताच चामोर्शी तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. आपल्या हक्काच्या जमिनी वाचवण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी 'मुंडन आंदोलन' करत सरकारचा तीव्र निषेध केला. आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या जमिनी प्रकल्पासाठी देणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे. भाजप नेत्यांच्या भागीदारीवर प्रश्नचिन्ह या संपूर्ण प्रक्रियेत सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे हितसंबंध गुंतलेले असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केल्याने या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. स्थानिक नागरिकांचा रोष पाहता, सरकार या प्रकल्पाबाबत माघार घेणार की अधिग्रहण प्रक्रिया रेटून नेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्योग आणि विकास गरजेचा असला तरी, तो अन्नदात्याच्या पोटावर पाय देऊन नसावा, अशी भावना स्थानिक जनतेमध्ये निर्माण झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 5:13 pm

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेचा ठेका कुणी दिला?:ठाकरेंचे राजकारण केवळ स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी सरू, वंचित बहुजन आघाडीचा आरोप

मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्या ठाकरे कुटुंबावर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. 'ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी?' त्यांचे राजकारण हे केवळ स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी सुरूआहे, असे त्यांनी म्हटले आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांचा महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात कथितपणे सहभाग होता. त्यांनीच शिवसेनेतील फुटीवेळी बंडखोर आमदारांची गुवाहाटीमध्ये सोय केल्याचा आरोप केला जातो. पण त्यानंतरही ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे तथा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यामुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना सुजात आंबेडकर यांनी त्यांच्यावर उपरोक्त शब्दांत निशाणा साधला आहे. मोहित कंबोज भाजपचा ब्रोकर सुजात आंबेडकर एका पोस्टमध्ये म्हणाले, ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी? भाजपचा ब्रोकर म्हणून काम करणारा मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला काल आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. हा तोच मोहित कंबोज आहे, ज्याने महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिवसेना आमदार गुवाहाटीला पळवून नेण्यात हात होता. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे ठाकरे कुटुंब हे मराठी माणसांसाठी नाही तर स्वतःच पक्ष वाचवण्यासाठी राजकारण करताय. मराठी माणूस, मराठी अस्मिताच्या नावाने गप्पा मारणारे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी किती मराठी शाळा उघडल्या? मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जात असतांना मुंबई महापालिकेत 25 वर्ष सत्तेत असणारे उद्धव ठाकरे यांनी काय केले? यांच्या नाकर्तेपणामुळे मराठी माणूस हद्दपार झाला. मुंबई महानगरपालिकेत किती मराठी कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर यांनी तयार केले? किती मराठी उद्योगपती निर्माण केले? मुंबईत 25 वर्षे सत्ता असताना मराठी माणूस आठवला नाही ते पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिण भारतीय लोकांविरोधात 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' म्हणून आंदोलन केले, त्यांचेच नातू आदित्य ठाकरे हे लुंगी घालून दक्षिण भारतीय लोकांच्या मतांसाठी फिरत होते. जेव्हा यांना गुजराती लोकांची मतं हवी होती, तेव्हा हे 'केम छो वरली' म्हणत गुजराती मतांसाठी लोटांगण घालत होते. जेव्हा यांचा पक्ष अडचणीत आला, तेव्हा मराठी मतांसाठी मराठी अस्मितेचे राजकारण करू लागले. बीएमसीमध्ये 25 वर्ष सत्तेत असताना यांना मराठी माणूस आठवला नाही. 6 डिसेंबरला चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला येणारे लोकं ही सुद्धा मराठीच असतात, तेव्हा शिवाजी पार्क परिसरात राहणारे राज ठाकरे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक मुंबई सोडून बाहेर पळून जातात. तेव्हा कुठे जाती तुमची मराठी अस्मिता? जेव्हा यांचा पक्ष व्हेंटिलेटरवर असतो तेव्हा-तेव्हा ते मराठी लोकांच्या नावाने राजकारण करतात. अशा भामट्या लोकांपासून सावधान, असे सुजात आंबेडकर म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 5:10 pm

अभिनेत्री सोनम कपूर दुस-यांदा झाली आई

मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूडमधून आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ४० व्या वर्षी दुस-यांदा आई झाली आहे. बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. सोनम कपूरने २९ मार्चला मुलाला जन्म दिला. सोनम कपूर आणि आनंद […] The post अभिनेत्री सोनम कपूर दुस-यांदा झाली आई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 5:07 pm

मोहम्मद सिराज लवकरच विवाहबंधनात?

मुंबई : प्रतिनिधी टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडूचे आणि एका टेलिव्हिजन अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून ‘बिग बॉस’ फेम माहिरा शर्मा आहे. तर ज्या क्रिकेटपटूच्या चर्चा सुरू आहेत, तो भारतीय क्रिकेटपटू म्हणजे, मोहम्मद सिराज. माहिरा शर्मा आणि मोहम्मद सिराज यांच्या अफेअरच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. क्रिकेट आणि बॉलिवूड […] The post मोहम्मद सिराज लवकरच विवाहबंधनात? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 5:03 pm

‘गरीबांचा फास्ट फूड’ महागला!

पुणे : प्रतिनिधी महिना उलटला तरी आखाती युद्ध सुरूच असल्यामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई तीव्र झाली आहे. महागाई वाढल्याने हॉटेल्ससह खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर मिळणा-या पदार्थांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कामगार, विद्यार्थी आणि दैनंदिन उत्पन्नावर जगणा-या सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसला आहे. सध्या हॉटेल, खानावळी आणि हातगाडी चालकांनी खाद्यपदार्थांच्या दरात वाढ केली आहे. […] The post ‘गरीबांचा फास्ट फूड’ महागला! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 4:58 pm

मोहित कंबोजच्या घरी आदित्य ठाकरेंची हजेरी:'त्या' जुन्या संघर्षाला पूर्णविराम की नव्या समीकरणाची नांदी? चर्चांना उधाण

महाराष्ट्राच्या राजकारणात 'गनिमी कावा' आणि 'धक्कातंत्र' नवीन नाही, मात्र शनिवारी रात्री एका कौटुंबिक सोहळ्यात जे घडले, त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित पार्टीत चक्क शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. ज्या कंबोज यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे कुटुंबावर आणि शिवसेनेवर अत्यंत बोचरी टीका केली होती, त्यांच्याच एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे पोहोचल्याने राजकीय वैर संपले का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. मोहित कंबोज आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोहित कंबोज यांनी अनेकदा 'मातोश्री'ला लक्ष्य केले होते. एकदा तर कंबोज यांची गाडी मातोश्रीबाहेर असताना शिवसैनिकांनी मोठा राडा केला होता. आयएनएस विक्रांत निधी प्रकरण असो वा सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील आरोप, कंबोज हे भाजपच्या बाजूने आघाडीवर राहून ठाकरेंवर तुटून पडत असत. शिवसेना फुटीच्या वेळीही ते एकनाथ शिंदे यांच्या गटाला उघड पाठिंबा देताना दिसले होते. इतकेच नव्हे, तर शिंदेंच्या आमदारांना गुवाहटीला जाण्यास मोहित कंबोज यांनीच मदत केल्याची चर्चा आहे. अशा तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, आदित्य ठाकरेंचे कंबोज यांच्या घरी जाणे हे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. दिगज्जांची मांदियाळी, पण लक्ष आदित्य ठाकरेंकडेच! मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात केवळ राजकारणच नाही, तर उद्योग आणि बॉलिवूडमधील बड्या हस्ती उपस्थित होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री आशिष शेलार, श्रीकांत शिंदे, अमित साटम आणि मिलिंद नार्वेकर यांच्यासह बॉलिवूडमधील शाहरुख खान, संजय दत्त, रितेश देशमुख आणि उद्योजक अनंत अंबानी हे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे, ठाकरे गटाचे महत्त्वाचे मानले जाणारे नेते मिलिंद नार्वेकर हे देखील आदित्य ठाकरेंच्या सोबत होते. या सर्व उपस्थितीमध्ये सर्वाधिक चर्चा ही आदित्य ठाकरेंचीच झाली, कारण त्यांचा आणि कंबोज यांचा राजकीय इतिहास हा संघर्षाचा राहिला आहे. वैयक्तिक संबंध विरुद्ध राजकीय भूमिका ठाकरे गटाकडून हा केवळ एक वैयक्तिक आणि कौटुंबिक दौरा असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत वैयक्तिक सुख-दुःखाच्या प्रसंगी राजकीय मतभेद विसरून एकत्र येण्याची परंपरा आहे. ही भेट त्याच परंपरेचा भाग असल्याचे ठाकरे गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपसोबतच्या 'सॉफ्ट कॉर्नर'ची चर्चा सध्या राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात काही जागावाटपावरून किंवा श्रेयावरून कुरबुरी समोर आल्या आहेत. अशा काळात आदित्य ठाकरेंनी भाजपच्या जवळच्या नेत्याच्या घरी जाणे, हे भाजपला एक 'सिग्नल' असू शकतो का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ट्रोलर्सच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे सोशल मीडियावर मात्र आदित्य ठाकरे यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ज्यांनी मातोश्रीवर आरोप केले, त्यांच्याच घरी कशासाठी? असा सवाल निष्ठावान शिवसैनिक आणि नेटकरी विचारत आहेत. या भेटीमुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकारणात 'परमनंट' काहीच नसते! या भेटीतून एक गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे की, राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. पडद्यामागे अनेकदा अशा भेटीगाठी होत असतात ज्या सार्वजनिक जीवनात आपण पाहतो त्यापेक्षा वेगळ्या असतात. ही भेट केवळ 'शुभेच्छा' देण्यापुरती मर्यादित होती की त्यामागे भविष्यातील कोणत्याही राजकीय युतीचे धागेदोरे दडलेले आहेत, हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास तरी, मोहित कंबोज आणि आदित्य ठाकरे यांची ही 'हॅप्पी बर्थडे' भेट महाराष्ट्राच्या राजकारणात 'टॉक ऑफ द टाऊन' ठरली आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 4:54 pm

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी:पुणे, पिंपरी - चिंचवड, वाशिममध्ये पाऊस; वातावरणात गारवा, पण शेतीचे नुकसान

राज्यात आज पुणे व वाशिम जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी दुपारी अचानक झालेल्या या पावसामुळे उन्हामुळे हैरान झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पण त्याचवेळी शेतात उभ्या पिकांचे चांगलेच नुकसान झाले. पुणे शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी अचानक पुणे शहर विशेषतः बाणेर, बालेवाडी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यात बाणेर परिसरात मोठी गारपीट झाली. यामुळे रस्त्यांवर गारांचा खच पडल्याचे दिसून आले. सखल भागांत पाणी साचल्याचेही दिसून आले. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसामुळे शहरात दुपारच्यावेळीच अंधार झाल्याचे चित्र होते. जवळपास अर्धा तास ही स्थिती होती. या अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. त्यांनी मिळेल तिथे आसरा घेऊन स्वतःचा पावसापासून बचाव केला. वाशिम जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस दुसरीकडे, वाशिम जिल्ह्यातही आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. रिसोड तालुक्यातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे बीजवाई कांदा, आंबा व फळबागांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. कापणीला आलेल्या पिकांनाही या पावसाचा फटका बसला. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात आजपासून 4 एप्रिलपर्यंत ढगाळी वातावरण व दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवे सत्र सुरू होणार आहे. त्यात प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातही काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. कधी-कुठे पावसाची शक्यता? 30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. पण या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान व वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर 1 ते 4 एप्रिलपर्यंत वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणी ढगाळी वातावरण, दुपारनंतरचा वादळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रब्बी पिकांची काळजी घ्या त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवस हवामानाच्या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत, सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, तसेच वादळी वारे, पाऊस व संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे. मेघगर्जना व विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीजेचे खांब व विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन या प्रकरणी करण्यात येत आहे. मुंबईतील हवामान कसं असेल? उल्लेखनीय बाब म्हणजे बुधवार - गुरूवारी राज्यातील काही भागांत तापमानाचा पारा 39 अंशावर पोहोचला होता. परभणी जिल्हा राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला असून बुधवारी येथे 39.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यानंतर सोलापूरमध्ये 39 अंश सेल्सिअस, तर जळगावमध्ये 38.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. मराठवाड्यातील काही भागांत पारा 37 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. या आठवड्यात होणाऱ्या पावसामुळे हा पारा उतरण्याची शक्यता असली तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 4:28 pm

बदलत्या काळानुसार रागप्रहर संकल्पना लवचिक असावी:डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या ‘रागप्रभा’ संगीतोत्सवातील परिसंवादात तज्ज्ञांचे मत

बदलत्या काळानुसार रागसंगीतातील कालप्रहराची संकल्पना अधिक लवचिक असावी, अशी भूमिका शहरात झालेल्या एका परिसंवादात मांडण्यात आली. डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘रागप्रभा संगीतोत्सव’ अंतर्गत ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ या विषयावर हा परिसंवाद पार पडला. या चर्चासत्रात पंडित अरुण कशाळकर, डॉ. अलका देव-मारुलकर, पंडित साजन मिश्रा, पंडित श्रीनिवास जोशी, डॉ. केशवचैतन्य कुंटे आणि डॉ. सुश्रुती संतानाम यांनी सहभाग घेतला. सुप्रसिद्ध संवादिनी वादक सुयोग कुंडलकर यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. पंडित अरुण कशाळकर यांनी रागांची कालप्रहरानुसार मांडणी का केली गेली, याचा सखोल अभ्यास आवश्यक असल्याचे नमूद केले. संगीताचे अंतिम ध्येय आनंदनिर्मिती असल्याने वेळेचे बंधन दुय्यम ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. पंडित साजन मिश्रा यांनी बनारस घराण्याच्या परंपरेचा उल्लेख करत कालानुरूप सादरीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे मध्यम मार्ग स्वीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. डॉ. अलका देव-मारुलकर यांनी रागप्रहरांचे वर्गीकरण काळानुसार बदलत गेले असल्याचे सांगितले. संगीताचा शरीर-मनावर होणाऱ्या परिणामाचा वैज्ञानिक अभ्यास गरजेचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कालसंकल्पनेतून मुक्त सादरीकरण शक्य असले तरी त्यासाठी कलाकार आणि श्रोत्यांमधील संवाद महत्त्वाचा असल्याचे मत त्यांनी मांडले. डॉ. केशवचैतन्य कुंटे यांनी हिंदुस्तानी रागसमय सिद्धांत, त्याचे ऐतिहासिक संदर्भ आणि ऋतूंशी असलेले नाते यावर प्रकाश टाकला. तर डॉ. सुश्रुती संतानाम यांनी कर्नाटक संगीतात कालप्रहराचे बंधन कमी असल्याचे सांगत राग समजून घेण्यासाठी कलाकाराची आकलन क्षमता महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. पंडित श्रीनिवास जोशी यांनी संगीत सादरीकरणासाठी कोणतीही ठराविक आचारसंहिता नसल्याचे सांगितले. परंपरा आणि प्रयोगशीलता यामधील संतुलन आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या संगीत महोत्सवाचा समारोप सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाने आणि विश्वमोहन भट्ट यांच्या मोहनवीणा वादनाने झाला. त्यांनी विविध रागांची सादरीकरणे करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 4:10 pm

अशोक खरातच्या केबिनची SIT कडून झडती:औषधांच्या बाटल्या, विविध खडे जप्त; लाईव्ह स्क्रीनिंग करत 'डिजिटल पंचनामा' पूर्ण

नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणी एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमने आज पुन्हा एकदा कॅनडा कॉर्नर येथील 'ओकस प्रॉपर्टीज' या कार्यालयाची कसून झडती घेतली. तपासाचा भाग म्हणून एसआयटीने पीडित महिलांना सोबत घेऊन या कार्यालयात प्रत्यक्ष गुन्ह्याच्या ठिकाणाची पाहणी केली, जिथे 150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचा गंभीर आरोप आहे. खरातने पीडितांवर अत्याचार करण्यासाठी कार्यालयातील कोणत्या जागांचा वापर केला, याची सविस्तर माहिती आणि पुरावे संकलित केल्यानंतर आजचा हा तपास पूर्ण झाला असून, या कारवाईमुळे खरातच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ओकस प्रॉपर्टीज कार्यालयात एसआयटीने पीडित महिलांना सोबत घेऊन गुन्ह्याचा सविस्तर पंचनामा केला. या झाडाझडती दरम्यान पथकाने घटनास्थळावरून औषधांच्या बाटल्या, विविध आकारांचे खडे आणि इतर संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, तपास पथकाने मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या साहाय्याने या संपूर्ण प्रक्रियेचे लाईव्ह स्क्रीनिंग करत 'डिजिटल पंचनामा' पूर्ण केला आहे. लैंगिक शोषणाचे 8, आर्थिक फसवणुकीचे 2 गुन्हे दाखल अशोक खरातवर आतापर्यंत लैंगिक शोषणाचे 8 आणि आर्थिक फसवणुकीचे 2 गुन्हे दाखल असून, ताज्या तपासानंतर त्याच्याविरुद्धच्या गुन्ह्यांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एसआयटीने पीडितांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष घटनाक्रम जाणून घेतल्याने खरातच्या अडचणी वाढल्या असून, या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलीस आता त्याच्या गुन्हेगारी साम्राज्याचा अधिक सखोल तपास करत आहेत. मोबाईलमध्ये अडीच हजारांहून अधिक नंबर 'कोडवर्ड'मध्ये सेव्ह अशोक खरातच्या खरातच्या मोबाईलमध्ये तब्बल अडीच हजारांहून अधिक नंबर 'कोडवर्ड'मध्ये सेव्ह असून, त्यामध्ये अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावे 'डमी' स्वरूपात लपवल्याचा संशय एसआयटीला आहे. विशेष म्हणजे, पीडित महिलांशी संपर्क साधण्यासाठी तो या मोबाईलचा वापर न करता एका वेगळ्याच उपकरणाचा वापर करत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. सध्या फॉरेन्सिक टीम या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याचे काम करत असून, या तांत्रिक पुराव्यांमुळे खरातच्या गुन्हेगारी जाळ्यातील अनेक बड्या चेहऱ्यांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे. 'शिवानिका' संस्थेचे बँक खाते सील दरम्यान, अशोक खरातच्या 'शिवानिका' संस्थेचे बँक खाते सील केले आहे. यासोबतच खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घरे आणि दुकानांची माहिती मागवून मालमत्तेची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर येत असून, त्यात अडीच हजारांहून अधिक नंबर 'कोडवर्ड'मध्ये सेव्ह असल्याचे आढळल्याने या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. जप्त केलेली कागदपत्रे आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे एसआयटी आता खरातच्या गुन्हेगारी साम्राज्याची व्याप्ती शोधून काढत आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 3:52 pm

छत्रपती संभाजीनगरात LPG टंचाई-दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा संप:प्रवाशांचे हाल, संतप्त प्रतिक्रिया; गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगरात ऑटो एलपीजी गॅस टंचाईच्या निषेधार्थ रिक्षाचालकांनी संप पुकारला असून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अचानक बंद पडलेल्या रिक्षा सेवेमुळे रोजच्या प्रवासासाठी रिक्षांवर अवलंबून असलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. यासोबतच गॅस दरवाढीच्या विरोधात रिक्षाचालकांनी शहरात मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चादरम्यान रिक्षाचालकांनी ‘गॅस उपलब्ध करा, दरवाढ मागे घ्या' अशा मागण्या लावून धरल्या. शहरातील विविध भागांतून निघालेल्या या मोर्चामुळे काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. रिक्षाचालकांचा संताप अधिक तीव्र होताना दिसत आहे. ‘एलपीजी गॅस मिळत नाही, आणि मिळाला तरी महाग झाला आहे. अशा परिस्थितीत व्यवसाय कसा करायचा?’ असा सवाल रिक्षाचालकांनी उपस्थित केला. तर “रिक्षा मिळत नाहीत, त्यामुळे खूप त्रास होतोय. पर्यायी व्यवस्था नाही,” अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली. या ग्राउंड रिपोर्टमधून जाणून घेऊया नेमकी काय परिस्थिती आहे… रिक्षाचालकांचा संतापही स्पष्ट दिसून येत आहे. “एलपीजी गॅस सहज उपलब्ध होत नाही, तासंतास रांगेत उभं राहावं लागतं. रोजचा व्यवसाय ठप्प होतोय, त्यामुळे संपाशिवाय पर्याय नाही,” असे एका रिक्षाचालकाने सांगितले. दरम्यान, रिक्षाचालक संघटनांनी प्रशासनाकडे तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. अशी आहे शहराची स्थिती: आगामी 2 दिवस पुरवठा नाहीच!- जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी शहरातील चारही एलपीजी पंपांची पाहणी केली असता, सर्व पंपांवरील गॅस संपल्याचे समोर आले. पुढील दोन दिवस पुरवठा होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, अंबादास दानवे यांच्या कार्यालयात रिक्षाचालकांची बैठक पार पडली. दोन दिवसांत प्रश्न सुटला नाही, तर चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, गॅस उपलब्ध असताना पंप २४ तास सुरू ठेवावेत आणि इंधन भरल्याची अधिकृत पावती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. नियंत्रण नसेल तर एनओसी रद्द करा- पालकमंत्री शिरसाट पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की, शहरातील रिक्षाचालकांचे इतके हाल का होत आहेत? या प्रश्नावर जिल्हा पुरवठा अधिकारी फुलारी म्हणाले की, ऑटो एलपीजीवर आमचे नियंत्रण नाही. नागपूरचे अधिकारी आमचा फोन उचलत नाहीत, तर शिरसाट संतापाने म्हणाले “जर नियंत्रण नसेल तर ते तुमची एनओसी घेऊनच पंप चालवतात ना? मग्रुरीने पंप चालवत असतील तर थेट त्यांची एनओसी रद्द करा! रिक्षाचालकांनी शहरात मोर्चा, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी कडाक्याच्या उन्हात रिक्षा बंद, नागरिकांची गैरसोय दरम्यान, कडाक्याच्या उन्हात रिक्षा बंद असल्याने नागरिकांची अधिकच गैरसोय होत आहे. बसस्थानकांवर मोठी गर्दी होत असून बसही पूर्ण भरून जात आहेत. त्यामुळे अनेकांना उभं राहून प्रवास करावा लागत आहे, तर काहींना बस मिळणंही कठीण होत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. आता प्रशासन यावर काय तोडगा काढते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 3:45 pm

तरच एलपीजी सिलिंडर सेवा बंद:पीएनजी नियमावर भुजबळांचे मोठे स्पष्टीकरण; इंधन संकटाच्या चर्चेमागचे खरे सत्य काय?

राज्यात एलपीजी सिलेंडर आणि इंधन तुटवड्याच्या अफवा वेगाने पसरत असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका मांडली आहे. राज्यात कोणत्याही प्रकारचा गॅस किंवा इंधन तुटवडा नसून भारत सरकारकडे पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले. भुजबळ यांनी स्पष्ट केले की, काही शहरांमध्ये पीएनजी सुविधा उपलब्ध असूनही अनेक नागरिकांनी त्यासाठी अर्ज केलेला नाही. अशा ठिकाणी, जर पीएनजी लाईन पूर्णपणे कार्यान्वित झाली आणि नागरिकांनी तीन महिन्यांच्या आत अर्ज केला नाही, तर त्या भागात एलपीजी सिलिंडर सेवा बंद केली जाऊ शकते. मात्र, हा नियम संपूर्ण राज्यासाठी लागू नसून केवळ पीएनजी सुविधा उपलब्ध असलेल्या शहरी भागांपुरता मर्यादित असेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असला, तरी भारतात परिस्थिती नियंत्रणात असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. रशिया आणि व्हेनेझुएला यांसारख्या देशांकडून इंधन पुरवठा सुरू असून भारतीय जहाजे नियमितपणे ये-जा करत आहेत, त्यामुळे नागरिकांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे त्यांनी नमूद केले. याशिवाय, व्यावसायिक वापरासाठी गॅस पुरवठ्यात 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. एलपीजी साठाही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला असून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, ज्या नागरिकांनी पीएनजीसाठी अर्ज केला आहे पण अद्याप लाईन पोहोचलेली नाही, त्यांना एलपीजी सेवा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रेशन धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध दरम्यान, राज्यात रेशन धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांना तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी घेण्याची मुभा देण्यात आली आहे. केरोसीनही उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पीएनजी लाईनसाठी वेगळी परवानगी घेण्याची गरज नसून सरकारच ती सुविधा देणार आहे. तसेच, राज्यात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन लागू होणार नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट करत नागरिकांना दिलासा दिला आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 3:34 pm

भय्याजी जोशींनी 'उमेद' प्रकल्पाला भेट दिली:दिव्यांग मुलांच्या वसतिगृहासाठी समाजाच्या संवेदनशीलतेची गरज व्यक्त केली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांनी 'उमेद फाउंडेशन'च्या सेवाकार्याला समाजाच्या संवेदनशीलतेची साथ मिळायला हवी, असे प्रतिपादन केले. पुणे जिल्ह्यातील पौड येथे दिव्यांग मुले आणि त्यांच्या पालकांसाठी उभारलेल्या 'बालक-पालक' या विशेष वसतिगृह प्रकल्पाला त्यांनी नुकतीच भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. सेवा संस्थांच्या पाठीशी समाजाची शक्ती उभी राहणे महत्त्वाचे आहे, असे जोशी म्हणाले. उमेद फाउंडेशनसारख्या संस्था अत्यंत कठीण परिस्थितीत दिव्यांग मुले आणि त्यांच्या पालकांसाठी जे कार्य करत आहेत, त्याला समाजाने आपली जबाबदारी मानून साथ दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. कोथरूडमधील उमेद फाउंडेशनने पौड येथे उभारलेला हा दोन मजली वसतिगृह प्रकल्प लोकाश्रयातून उभा राहिला आहे. या प्रकल्पात मतिमंद मुले आणि त्यांच्या पालकांच्या निवासाची तसेच प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. भय्याजी जोशी यांनी भेटीदरम्यान प्रकल्पातील विविध सुविधांची पाहणी केली. यावेळी पुणे महानगराचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर, संभाजी भागाचे संघचालक प्रा. अनिलजी व्यास आणि परमहंसनगरचे संघचालक बापू जगताप उपस्थित होते. संभाजी भागाचे कार्यवाह रवीजी लाटे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. जोशी पुढे म्हणाले की, या प्रकल्पाला 'शुभेच्छा' देणे योग्य नाही, कारण शुभेच्छा म्हणजे गरजूंची संख्या वाढणे. त्याऐवजी हे कार्य करताना येणाऱ्या अडचणी किमान असाव्यात आणि त्या लवकर दूर व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सेवा प्रकल्पांना केवळ आर्थिक मदत करणे सोपे असते, पण प्रत्यक्ष तिथे राहून काम करणे कठीण असते आणि उमेद फाउंडेशन हेच कठीण काम आत्मीयतेने करत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी संस्थेच्या स्थापनेपासूनचा प्रतिकूल प्रवास उमाताई जोशी यांनी उपस्थितांसमोर मांडला. जयंतराव पारखी यांनी संस्थेचे वेगळेपण स्पष्ट केले, तर संस्थापक संचालक राकेश सणस यांनी प्रकल्पाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 3:25 pm

नवेगाव - नागझिरातील 2 वाघ बेपत्ता:'पांगडी' गायब होताच 'जांभडी'ची एंट्री; वन्यजीव वर्तुळात चिंता

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून 'पांगडी' नावाचा नर वाघ आणि एक वाघीण गेल्या सहा महिन्यांपासून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वन्यजीव वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, 'पांगडी' गायब होताच त्याच क्षेत्रात 'जांभडी' या नवख्या पण ताकदवान नर वाघाने प्रवेश केला असून, त्याने आपला दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. गोंदिया येथील 'सेवा' संस्थेने या संशयास्पद घडामोडींवर लक्ष वेधत वनविभागाला सतर्क केले आहे. ६५६ चौ.कि.मी. गाभा आणि १,२४१ चौ.कि.मी. बफर क्षेत्र असलेल्या या प्रकल्पात वाघांच्या प्रादेशिक समीकरणात मोठी उलथापालथ सुरू असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. 'सेवा' संस्थेचे सावन बाहेकर यांनी सांगितले की, 'पांगडी'सारखा बलाढ्य नर वाघ विनाकारण आपला अधिवास सोडत नाही. लढाईचे कोणतेही पुरावे नसताना त्याचे अचानक गायब होणे गंभीर आणि संशयास्पद आहे. विशेषतः मानवी हस्तक्षेप जास्त असलेल्या बफर झोनमध्ये ही घटना घडल्याने संशयाचे धुके अधिक गडद झाले आहे. बाहेकर यांनी वनविभागाकडे कॅमेरा ट्रॅपद्वारे विश्लेषण करण्याची, 'पांगडी'च्या गायब होण्यामागचे सत्य शोधण्याची आणि 'जांभडी'ने प्रदेश कसा ताब्यात घेतला याचा सखोल अभ्यास करण्याची मागणी केली आहे. वनविभागाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, 'एनटी-३' ही वाघीणही गेल्या सहा महिन्यांपासून दिसलेली नाही, ज्यामुळे अनिश्चितता वाढली आहे. 'पांगडी'ने पाच वाघिणींशी वीण केल्यामुळे त्याच्या पिल्लांवर आता नव्या नराकडून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बलाढ्य नराच्या गायब होण्याने 'सत्तेची पोकळी' निर्माण झाली असून, नव्या नरांमध्ये संघर्ष भडकण्याची चिन्हे आहेत. यामुळे जखमा, मृत्यू आणि अस्थिरता वाढण्याचा धोका आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 3:24 pm

सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू:ओळख पटवण्यात पोलिसांचा हलगर्जीपणा, पुण्याच्या तळेगाव दाभाडेतील घटना

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या एका जवानाचा अपघाती मृत्यू झाला. पोलिसांकडून त्याची ओळख पटवण्यात आणि कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात विलंब झाल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत प्रकाश कदम (रा. तळेगाव दाभाडे) हे गुजरातमधील गांधीनगर येथे सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. २५ मार्च रोजी ते ड्युटीवर जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, त्यानंतर ते लोणावळ्याहून तळेगावच्या दिशेने परतले, याची माहिती त्यांनी कोणालाही दिली नव्हती. त्यावेळी त्यांचा मोबाईल फोनही बंद होता. २५ मार्चच्या रात्री सोमाटणे फाटा परिसरात, हॉटेल अंगणसमोर रस्ता ओलांडताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याची नोंद करण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्याच कालावधीत प्रशांत कदम बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी याच पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तरीही, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आवश्यक ती तत्परता पोलिसांकडून दाखवण्यात आली नाही. मागील दोन ते तीन दिवस कुटुंबीय आणि पोलीस स्वतंत्रपणे शोधमोहीम राबवत होते. एकाच पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार आणि अनोळखी मृतदेहाची नोंद असतानाही, त्यांची सांगड घालण्यात पोलिसांना अपयश आले. यामुळे कुटुंबीयांना माहिती मिळण्यास उशीर झाला. प्रशांत कदम यांचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात असल्याची माहिती पोलिसांकडून नव्हे, तर त्यांच्या मित्रांनी शोध घेऊन कुटुंबीयांना आणि पोलिसांना दिली. गंभीर अपघातासारख्या घटनांमध्ये पोलिसांनी तातडीने तपास करून मृत व्यक्तीची ओळख पटवणे आणि नातेवाईकांशी संपर्क साधणे अपेक्षित असते. या प्रकरणात झालेल्या विलंबामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांमध्येही या प्रकारामुळे नाराजीचे वातावरण असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 3:22 pm

येरवडा निरीक्षण गृहात मुलाला मारहाण:सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल, चौकशी सुरू

पुणे शहरातील येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र संचलित बालकांच्या निरीक्षण गृहात एका मुलाला पाईपने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी निरीक्षण गृहातील सुरक्षा रक्षकाविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिमोन सुरेश साबळे (वय ४२) यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला नोटीस बजावण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक एन. सत्रे पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील हे पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र गंभीर तसेच किरकोळ गुन्हे करणाऱ्या अल्पवयीनांना बाल न्याय मंडळाच्या आदेशाने ठेवण्यासाठी आहे. या केंद्रात अल्पवयीनांचे समुपदेशनही केले जाते. निरीक्षण गृहातील एका अल्पवयीनाची दुसऱ्या अल्पवयीनासोबत भांडणे झाली होती आणि त्याने त्याला मारहाण केली होती. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने या अल्पवयीनाला प्लास्टिक पाईपने मारहाण केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर साबळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. बेकायदा पिस्तूल बाळगणारा जेरबंद दरम्यान, देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्पवयीनाला खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल परिसरात ही कारवाई करण्यात आली. दांडेकर पूल परिसरात खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना, एका अल्पवयीनाकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी आझाद पाटील यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अल्पवयीनाने पिस्तूल का बाळगले होते आणि तो गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होता का, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, उपनिरीक्षक गौरव देव, सुरेंद्र जगदाळे, अमोल राऊत, आझाद पाटील, शेखर खराडे, चेतन आपटे आणि किरण पड्याळ यांनी ही कारवाई केली.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 3:21 pm

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू:खराडीतील घटना; अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे येथील खराडी परिसरातील फॉरेस्ट पार्क रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव शुभम सुनील देवनाथ (वय २८, रा. अटलांटिक सोसायटी, केसनंद रस्ता, वाघोली, पुणे) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम देवनाथ हा खराडीतील फॉरेस्ट पार्क सोसायटी रस्त्याने जात असताना एका भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. या अपघातात शुभम गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी गंगाधर गोविंद शिंदे (वय ३२, रा. शिवरकर वस्ती, वाघोली, पुणे) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फाॅरेस्ट पार्क सोसायटी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक एस. पोटे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. खडकीत खंडणीसाठी कपडे व्यावसायीकाला धमकावले कपड्याचा व्यावसाय करायचा असेल तर पाच हजार हप्‍ता खंडणी स्वरूपात देण्याची मागणी एकाने केल्‍याप्रकरणी त्‍याच्‍यावर खडकी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. सलमान शेख (28, रा. खडकी) याच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका कपडे व्यावसायीकाने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचा खडकी बाजार येथील टिकाराम चौकात कपड्याचा व्यावसाय आहे. आरोपीने तक्रारदार यांना येथे कपड्याचा व्यावसाय करायचा असेल तर दर महा पाच हजार रूपये हप्‍त्‍याची मागणी केली. ही खंडणीची रक्‍कम न दिल्‍यास जागा खाली कर म्‍हणत तक्रारदाराच्‍या पत्‍नीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तक्रारदाराच्‍या अंगावर आरोपी धावून गेला. पुढील तपास खडकी पोलिस करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 3:20 pm

धार्मिक कार्यक्रमांसाठी मदत केली तर चुकले का?:गॅस सिलिंडर प्रकरणी मंगलप्रभात लोढांचे स्पष्टीकरण, म्हणाले- आमदार म्हणून जबाबदारी

महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन बांधवांच्या उत्साहवासाठी त्यांच्या मतदारसंघात मलबार हिल येथे 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 सिलिंडरची मागणी केली होती. ही मागणी त्यांनी पत्राद्वारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली होती. यावरून वादंग निर्माण झाले आहे. राज्यात गॅस टंचाई असल्याचा शिक्कामोर्तब एका मंत्र्यानेच केला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तसेच लोढा हे राज्याचे मंत्री असून देखील केवळ एका धर्मासाठी अशी मागणी कशी करू शकतात, असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला आहे. यावर आता लोढा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मंगलप्रभात लोढा त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर व टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले, हिंदू सणाच्यावेळी आणि धार्मिक कार्यक्रमांवेळी टीका करायची ही एक फॅशन झाली आहे. माझ्यावर झालेली टीका त्याच नरेटिव्हचा भाग आहे. माझ्या मतदारसंघात रामनवमी, साई भंडारा, जैन धर्माचा कार्यक्रम हे विशेष धार्मिक कार्यक्रम आहे. त्यासाठी गॅसचा साठा नव्हता तर विशेष प्रयत्न करणे गरजेचे होते. माझ्याकडे साई भंडाऱ्याचे लोक आले होते, जैन धर्मीय लोक आले होते. मग त्यांना गॅस सिलिंडर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा नाही का? मी त्यासाठी प्रयत्न केला तर काही चुकले का? असा प्रतिसवाल लोढा यांनी उपस्थित केला. आमदार म्हणून माझी जबाबदारी पुढे बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले, 2 तारखेला हनुमान जयंती आहे, 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यासाठी विशेष धार्मिक कार्यक्रम असल्याने मला प्रयत्न करावा लागणारच आहे. माझी आमदार म्हणून ती जबाबदारी आहे. त्यामध्ये कोणाला गैर वाटत असेल किंवा कोणाला वाद निर्माण करायचा असेल तर त्याने करावा. मी जबाबदारीपासून पळ काढणार नाही. राज्यात गॅसचा तुटवडा नाही, राज्य सरकार चांगलं काम करत आहे. फक्त विशेष धार्मिक कार्यक्रमांच्यावेळी गॅस सिलिंडर मिळवायला प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे तेढ निर्माण करणे सोडा, असेही त्यांनी म्हटले आहे. मंत्री मंगलप्रभात लोढांचे गॅसची मागणी करणारे पत्र व्हायरल मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, चैत्र महिन्यात एकदाच येणाऱ्या ओली आयंबील हा जैन धर्मातील एक महत्त्वाचा सन आहे. या दिवशी उपवास, पूजा व विशेष धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पाडले जातात. या निमित्ताने मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंबिल (पारंपरिक पेय) तयार करून भक्तांना वितरण केले जाते. माझ्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील 16 जैन मंदिरांमध्ये ओली (अंबिल) निमित्त मोठ्या प्रमाणावर व्यवस्था केली जाते. यासाठी प्रत्येक मंदिरास 5 गॅस सिलिंडरची आवश्यकता आहे. सबब, आपणास नम्र विनंती आहे की, या 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 सिलिंडर उपलब्ध करून देण्यास सहकार्य करावे. जैन धर्मीय समाज आपल्याकडून या बाबतीत सकारात्मक मदतीची अपेक्षा ठेवून आहे. आपल्या सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी राहू. सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार:गॅस टंचाईवरून रोहिणी खडसेंची बोचरी टीका; मंत्री लोढांकडून सिलिंडरची मागणी इराण विरुद्ध अमेरिका - इस्त्रायल युद्धामुळे राज्यात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकार वारंवार निवेदन जाहीर करून असा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा करत आहे. मात्र रविवारी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीच एका पत्राद्वारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे गॅस सिलिंडर्सची मागणी केल्यामुळे या तुटवड्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. लोढा यांनी गॅस सिलिंडरच्या मागणीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत टीका केली आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 3:11 pm

शरद पवार गटाचा शिंदे गटावर पलटवार:खासदार ज्योती वाघमारे ऑपरेशन केव्हापासून करायला लागल्या कळले नाही - शशिकांत शिंदे

सत्ताधारी शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जोरदार पलटवार केला आहे. खासदार ज्योती वाघमारे दिल्लीत जाऊन केव्हापासून ऑपरेशन करायला लागल्या हे कळत नाही, असे ते म्हणालेत. प्रा. ज्योती वाघमारे नुकत्याच एका कार्यक्रमासाठी नांदेड दौऱ्यावर गेल्या होत्या. तिथे त्यांनी ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारी होणार, पण ते योग्य वेळी होणार, असे सांगत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले, ज्योती वाघमारे यांना प्रथमच राज्यसभेवर संधी मिळाली आहे. त्यामुळे त्या जनतेच्या प्रश्नावर बोलतील अशी अपेक्षा आहे. पण दिल्लीत गेल्यानंतर त्या ऑपरेशन कधीपासून करायला लागल्या हे मला कळत नाही. ज्योती वाघमारे यांनी ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारी करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करावे. आता इराण व अमेरिका - इस्त्रायल युद्ध सुरू आहे. त्याचा मोठा जनतेला बसत आहे. या प्रकरणी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. वाघमारे यांनी या अडचणींवर बोलावे. ते म्हणाले, ऑटो चालकांना शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यापुढे प्रश्न मांडताना अश्रू अनावर झाले होते. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही गॅस टंचाईविषयी पत्रातून भाष्य केले आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही प्रकारची गॅस टंचाई नसल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे गॅस टंचाईमुळे हॉटेलांमधील पदार्थ कमी होत आहेत. त्यामुळे ज्योती वाघमारे यांनी ही टंचाई, युद्ध परिस्थिती व भविष्यातील संकट यावरही लक्ष द्यावे. आमचा एकही खासदार फुटणार नाही शशिकांत शिंदे म्हणाले, माझ्या माहितीनुसार शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यासह आमचे खासदार दिल्लीत युद्ध व त्याचे परिणाम यावर आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. त्यामुळे आमचे ऑपरेशन वगैरे काही होणार नाही. एखादेवेळी पर्याय निर्माण होतो आणि तो पर्याय आहे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार साहेबांचा पक्ष चर्चेत आणण्याचे काम कोण करत आहे? हे ऑपरेशन राज्यात व केंद्रात कशासाठी केले जात आहे? आमचा एकही खासदार फुटणार नाही. सत्ताधारी पक्षाकडे एवढे बहुमत असताना हे फोडाफोडीचे राजकारण का केले जात आहे हे मला कळत नाही, असे ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 3:08 pm

अमित ठाकरेंनी घेतली बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी; दोषी जेलमधून निवूडण येतात, हे आपले अपयश- ठाकरे

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या काळात सोलापुरात घडलेली मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या ही संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेला हादरवणारी ठरली होती. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच हा रक्तरंजित प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेची मनसे नेते अमित ठाकरे यांनी गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांना यावर तात्काळ कारवाई करण्याची विनंती केली होती. आता पुन्हा एकदा अमित ठाकरे यांनी सरवदे कुटुंबीयांची भेट घेतली आहे. तसेच बाळासाहेब सरवदे यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी अमित ठाकरे यांनी घेतली आहे. सरवदे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अमित ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात का? असा प्रश्न विचारला असता अमित ठाकरे म्हणाले, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कारण जे दोषी आहेत ते जेलमध्ये राहून जर निवडून येऊ शकतात तर मला वाटते की आपण सगळीकडे कुठेतरी कमी पडतोय. त्या ज्या बाई आहेत, त्या जर जेलमध्ये राहून सुद्धा निवडून येऊ शकतात, तर हे आपल्या सगळ्यांचे अपयश आहे. त्यावर मला बोलायचे नाही, हे विचित्र काहीतरी सोलापूरमध्ये घडले आहे. पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले, त्यावेळेला जेव्हा मी आलो होतो, तेव्हा मला जो आक्रोश बघायला मिळाला, जो राग बघायला मिळाला, ज्या प्रकारे लोक रडत होते आणि अशा काळात मला कळले नाही की अशी बाई कशी काय निवडून येते? असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. डोळ्यात चटणी टाकून धारदार शस्त्राने केला होता खून दरम्यान, सोलापूर येथील भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांनी मयत बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यात चटणी टाकून इतर आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. मयत बाळासाहेब यांचा भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे याच्या फिर्यादीवरून एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएनएस कलम 103, 109, 189 (1),(2), 190, 191(2),(3), 49, 352, 351(2), शस्त्र अधिनियम 4, 25 आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 2:46 pm

एकनाथ खडसे कुटुंबाच्या अडचणीत वाढ:साखर कारखान्याच्या नावाखाली जमीन व्यवहार? महार वतन जमीन प्रकरणात गंभीर आरोप

जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. साखर कारखाना उभारण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची महार वतन जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. अनेक वर्षांनंतर हा व्यवहार समोर आल्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण 2002 सालातील असल्याची माहिती समोर आली आहे. भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील गट क्रमांक 122 मधील जमीन ही चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची होती. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी ‘तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना’ सुरू करण्याचे आश्वासन देत जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावेळी जमिनीला चांगला मोबदला देण्यासोबतच कुटुंबातील सदस्यांना कारखान्यात नोकरी देण्याचेही आश्वासन दिले गेले होते. तक्रारीनुसार, जमीन व्यवहार करताना अशिक्षितपणाचा फायदा घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. केवळ 51 हजार रुपये आगाऊ देऊन कुटुंबीयांचे अंगठे घेण्यात आले आणि बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र, अनेक वर्षे उलटूनही त्या ठिकाणी कारखाना उभारण्यात आला नाही. 2025 मध्ये कुटुंबाने तपास केला असता, ही जमीन कारखान्याच्या नावावर नसून शारदा खडसे यांच्या वैयक्तिक नावावर असल्याचे उघड झाले. याशिवाय, मूळ खरेदीखतात फेरफार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. 11 फेब्रुवारी 2026 रोजी खरेदीखताची प्रत तपासताना तापी-पूर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज या नावाऐवजी खोडून शारदा एकनाथ खडसे असे नाव लिहिल्याचे निदर्शनास आले. यानंतर तायडे कुटुंबाने रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. खडसे कुटुंबाच्या अडचणीत वाढ या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार, चमेलाबाई तायडे यांच्या फिर्यादीवरून एकनाथ खडसे, शारदा खडसे, मध्यस्थ सुधाकर पाटील तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या जुन्या व्यवहारामुळे खडसे कुटुंबाच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 2:44 pm

मंत्रिपद मिळावे म्हणून नीलम गो-हेंनी घेतली खरातची भेट

पुणे : प्रतिनिधी अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती वाढत असताना, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गो-हे खरातला अनेक वर्षांपासून ओळखत होत्या आणि कोरोनापूर्वी त्यांची भेट घेऊन भविष्य बघितल्याचा दावा देसाईंनी केला. महिलांवरील शोषणाच्या या गंभीर प्रकरणात नीलम गो-हेंनी आतापर्यंत शांत का राहिल्या, यावर देसाईंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले […] The post मंत्रिपद मिळावे म्हणून नीलम गो-हेंनी घेतली खरातची भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 2:28 pm

पालकमंत्र्यांच्या पंटरचा टक्केवारीचा चार्ट:दुरुस्तीच्या कामांसाठी १० ते १२ टक्के, विद्युतीकरणाच्या कामांसाठी २० टक्के कमीशन?

कथित व्हिडीओ वरून वादग्रस्त ठरलेले हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या पंटरांकडून कामांच्या मंजुरीसाठी अक्षरशः लुट होत असून टक्केवारीचा चार्टचीच जोरदार चर्चा शासकीय पातळीवर सुरु आहे. यामध्ये दुरुस्तीच्या कामांसाठी १२ ते १५ टक्के, विद्युतीकरणाच्या कामांसाठी २० टक्के तर नवीन कामांसाठी १० ते १२ टक्के निधीचे कमीनशन घेतले जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ नियुक्त झाल्यापासूनच वादग्रस्त ठरले आहेत. हिंगोली जिल्हयाचा उल्लेख गरीब जिल्हा, मागासलेला जिल्हा असे संबोधून जिल्ह्यातील नागरीकांचा अपमान केला. मात्र नागरीकांतून टिका होत असतांना त्यांनी यु टर्न घेऊन जिल्हयात चांगले काम करता येतील असे स्पष्ट केले. मात्र त्यांच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन समितीची एकही बैठक प्रत्यक्षस्वरुपात झाली नाही. सर्वच बैठका ऑनलाईन झाल्या अन कामांची मंजुरी देखील नाशीककडूनच पाठविण्यात आली. मागील आठवड्यात त्यांचा कथीत व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांतून पुन्हा एकदा रोष निर्माण झाला. क्रांतीकारी शेतकरी संघटनेने त्यांच्या राजिनाम्याची मागणी केल्यानंतर आता त्यांच्या सोबत असणाऱ्या तथाकथीत पीए अन पंटरकडून कंत्राटदारांशी झालेली सलगी अन नाशीकवारी करणाऱ्यांनाच कामे मिळू लागल्याच्या चर्चेने उधाण आले होते. त्यानंतर आता शासकिय कार्यालयातून त्यांच्या तथाकथीत पीए अन पंटरकडून कामे मंजुरीसाठी केली जाणारी देवाण घेवाण चर्चेचा विषय बनली आहे. नवीन कामांना मंजूरी देण्यासाठी एकूण मंजूर रकमेच्या १० ते १२ टक्के, दुरुस्तीच्या कामांसाठी एकूण मंजूर रकमेच्या १२ ते १५ टक्के तर विद्युतीकरणाच्या कामासाठी चक्क २० टक्के कमिशनची मागणी केली जात असल्याची चर्चा आहे. बहुतांश जणांनी सदर रक्कम देऊन कामे पदरात पाडून घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांच्या पंटरकडून अधिकाऱ्यांवर राजकिय दवाब आणला जात असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, या प्रकरणात कंत्राटदार व त्यांच्या पीए व पंटर यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढून त्याची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचेही दबक्या आवाजात बोलले जात आहे. कमीशनखोरीमुळे कामांचा दर्जा कसा राखला जाणार असा सवालही नागरीकांतून उपस्थित केला जाऊ लागला आहे. एका पीएची तातडीने हकालपट्टी या कमीनशनखोरीमध्येच हात मारणाऱ्या एका तथाकथीत पीए ची हकालपट्टी झाल्याची चर्चा सुरु झाली असून त्या पीएला पुन्हा त्यांच्या पदावर परत पाठविण्यात आल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 2:23 pm

शरद पवार पुन्हा मैदानात!

बारामती : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुन्हा उभारी घेण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार लवकरच राज्यभर संपर्क दौरा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून आरोग्याच्या कारणामुळे सक्रिय राजकारणातून थोडी विश्रांती घेतली होती. पक्षातील एका वरिष्ठ पदाधिका-याने एक वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची तब्येत आता स्थिर […] The post शरद पवार पुन्हा मैदानात! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 2:04 pm

रुपाली चाकणकरांची SIT चौकशीला दांडी:चौकशीला गैरहजर राहण्याचे कारण विक्षिप्त अन् क्षुल्लक - दमानिया; तटकरेंवरही नेम

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीपुढे हजर राहण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. आज त्यांची या प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता होती. पण त्यांनी महिला असल्यामुळे प्रवास करण्यास असमर्थ असल्याचे नमूद करत ही चौकशी टाळली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चाकणकरांनी दिलेले कारण अत्यंत विक्षिप्त व क्षुल्लक असल्याचा आरोप केला आहे. रुपाली चाकणकर ह्या भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टवर सदस्या आहेत. त्यांच्यावर भोंदू खरातचे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचाही आरोप आहे. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांना प्रथम राज्य महिला आयोग व त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार आज त्या चौकशीसाठी हजर राहणे अपेक्षित होते. पण त्यांनी चौकशीसाठी हजर राहणे टाळले. त्यामुळे त्यांच्या हेतूवर संशय व्यक्त केला जात आहे. चाकणकरांचे कारण अत्यंत विक्षिप्त अन् क्षुल्लक सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चाकणकरांवर हल्ला चढवत त्यांनी चौकशीला गैरहजर राहण्यासाठी फार किरकोळ कारण दिल्याचा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, रुपाली चाकणकरांना एसआयटीने समन्स बजावला होता. पण आता कळत आहे की, त्या एसआयटीपुढे जाणार नाहीत. त्यासाठी त्यांनी कारण एवढे क्षुल्लक व विक्षिप्त दिले गेले की, मी एक महिला आहे व मला प्रवास करायला त्रास होईल. हे कारण नक्कीच असू शकत नाही. कारण, याच रुपाली चाकणकरांना आपण तिथे अनेकदा जाताना पाहिले आहे. त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ पाहिलेत. त्यांचे पदराने पाय पुसतानाचे व्हिडिओ पाहिलेत. केक खातानाचे व्हिडिओ पाहिलेत. रुपाली चाकणकर असंख्य वेळा तिथे समारंभांना जात होत्या. आता अचानकपणे त्या म्हणत आहेत की, त्या महिला आहेत आणि प्रवास करू शकत नाहीत. ही कुणाच्याही बुद्धिला न पटण्यासारखी गोष्ट आहे. आता यात कायद्याने काय करता येईल? तर एसआयटीने पहिले समन्स पाठवून त्या आली नाहीत, तर त्यांना दुसरे समन्स पाठवावे लागेल. त्यानंतर कोर्टाकडून त्यांना तसे निर्देश घ्यावे लागतील. प्रथम जामीनपात्र वॉरंट घेऊन त्या आल्या नाहीत, तर अजामीनपात्र वॉरंट घेऊन त्यांना अटक करता येते. अशा विविध तरतुदी कायद्यात आहेत. आता पाहू त्यांना कधी बुद्धी येते व कधी डोक्यात प्रकाश पडून त्या एसआयटीपुढे जातात. त्यांना खरोखर काही लपवायचे नसते, तर त्या नक्कीच गेल्या असत्या. पण आज त्या चौकशीसाटी एसआयटीकडे गेल्या नाहीत, त्यावरून आपल्याला बरेच काही कळते, असे अंजली दमानिया म्हणाल्या. महिला व बालक कल्याण मंत्री मौन का? अंजली दमानिया यांनी यावेळी या प्रकरणी राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. महिला व बालकल्याण मंत्री यांना एक साधा प्रश्न. अशोक खरतांच्या प्रकरणावर तुमचं मौन का? एक महिला व बालकल्याण मंत्री म्हणून त्या इतक्या गंभीर प्रकरणावर काहीच कस बोलत नाहीत? असा प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 2:00 pm

खासदार होताच पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यसभा खासदार झाल्यानंतर पार्थ पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्था’वर जाऊन भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याआधी रोहित पवार यांनीही राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता पार्थ पवार यांनी मनसे अध्यक्षांची भेट […] The post खासदार होताच पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 1:51 pm

‘धुरंधर ’चा जगभरात धुमाकूळ, आतापर्यंत भल्याभल्या दिग्गजांना लोळवले

मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूडचा बाजीराव म्हणजे, तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला रणवीर सिंहची २०२६ ची सुरुवात अत्यंत जबरदस्त ठरली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या सिनेमाच्या यशाने त्याने नव्या वर्षाची सुरुवात केली आहे. पहिल्या भागाची क्रेझ अजूनही कायम असतानाच ‘धुरंधर २’ प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून घेतले आहे. सुरुवातीपासूनच प्रेक्षक आणि ट्रेड एक्सपर्ट्सना अपेक्षा […] The post ‘धुरंधर ’चा जगभरात धुमाकूळ, आतापर्यंत भल्याभल्या दिग्गजांना लोळवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Mar 2026 1:30 pm

सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार:गॅस टंचाईवरून रोहिणी खडसेंची बोचरी टीका; मंत्री लोढांकडून सिलिंडरची मागणी

इराण विरुद्ध अमेरिका - इस्त्रायल युद्धामुळे राज्यात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकार वारंवार निवेदन जाहीर करून असा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा करत आहे. मात्र रविवारी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीच एका पत्राद्वारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे गॅस सिलिंडर्सची मागणी केल्यामुळे या तुटवड्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. लोढा यांनी गॅस सिलिंडरच्या मागणीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत टीका केली आहे. रोहिणी खडसे यांनी ट्विट करत म्हटले की, मागील 10-15 दिवसांपासून आम्ही ओरडून ओरडून सांगतोय की देशभरासह महाराष्ट्रात गॅस सिलिंडरची मोठी टंचाई आहे. दोन दिवसांपूर्वी एका वृद्ध माजी सरपंचाचा सिलिंडरच्या रांगेत मृत्यू झाला तरी सरकार आणि सत्ताधारी आमदार म्हणतात 'कुठेय टंचाई? 25 दिवसांत सिलिंडर मिळते, ऑल इज वेल'. मंत्री लोढांनी सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले पुढे रोहिणी खडसे म्हणाल्या, आता सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा साहेबांनी जैन मंदिरांना प्रत्येकी पाच सिलिंडर देण्याची मागणी दुसरे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. खरेतर मंत्री महोदयांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी एका प्रकारे कबुली दिली की राज्यात सिलिंडरची प्रचंड टंचाई आहे. या मागणीच्या माध्यमातून त्यांनी सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे. आता सरकारने फक्त एक करावे, सिलिंडर टंचाईमुळे आणखी बळी जाऊ नयेत यासाठी त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी खडसे यांनी केली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढांचे गॅसची मागणी करणारे पत्र व्हायरल मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, चैत्र महिन्यात एकदाच येणाऱ्या ओली आयंबील हा जैन धर्मातील एक महत्त्वाचा सन आहे. या दिवशी उपवास, पूजा व विशेष धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पाडले जातात. या निमित्ताने मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंबिल (पारंपरिक पेय) तयार करून भक्तांना वितरण केले जाते. माझ्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील 16 जैन मंदिरांमध्ये ओली (अंबिल) निमित्त मोठ्या प्रमाणावर व्यवस्था केली जाते. यासाठी प्रत्येक मंदिरास 5 गॅस सिलिंडरची आवश्यकता आहे. सबब, आपणास नम्र विनंती आहे की, या 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 सिलिंडर उपलब्ध करून देण्यास सहकार्य करावे. जैन धर्मीय समाज आपल्याकडून या बाबतीत सकारात्मक मदतीची अपेक्षा ठेवून आहे. आपल्या सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी राहू.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 1:21 pm

डहाणूच्या नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्याची मागणी:सागरी किनारा नियमांच्या उल्लंघनाचा ठपका; पालघर दंडाधिकारी कार्यालयात याचिका

डहाणू नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या राजेंद्र माच्छी यांनी सागरी नियमन कायद्याचे तसेच डहाणू पर्यावरणविषयक नियमाचे उल्लंघन करून अतिक्रमणात त्यांचे निवासस्थान बांधले आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी करणारी याचिका माहिती अधिकार कार्यकर्ते फिरोज जमशेदजी यांनी दाखल केली आहे. फिरोज जमशेदजी यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या आपल्या याचिकेत म्हटले आहे, की माच्छी हे नगरसेवक असताना त्यांनी त्या वेळी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून नगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी आणि मान्यता न घेताच त्यांच्या निवासस्थानाचे बांधकाम केले आहे. त्यात अनेक नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. उमेदवारी अर्जासोबत खोटे प्रतिज्ञापत्र राजेंद्र माच्छी यांनी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नोटरीपुढे सादर केलेल्या या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दिलेली माहिती चुकीची आहे. त्यांनी बनावट आणि खोट्या माहितीचे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची दिशाभूल केली आहे. माच्छी यांची जागा समुद्राच्या कडेला आहे. सागरी क्षेत्र नियमांचे तसेच डहाणू पर्यावरणीय आराखड्यातील नियमांचे उल्लंघन करून कोणतीही विशेष परवानगी न घेता त्यांनी तेथे त्यांचे निवासस्थान बांधले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १८९ आणि १९० चे उल्लंघन झाले आहे. जादा एफएसआयचा वापर नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात इमारतीचे बांधकाम करताना ठराविक चटई निर्देशांक (एफएसआय) मिळतो; परंतु येथेही नियमांचे उल्लंघन करून जादा चटई क्षेत्र निर्देशांक वापरला आहे, असे या याचिकेत फिरोज यांनी म्हटले आहे. यापूर्वी माच्छी नगरसेवक असताना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव आणून विनापरवाना बांधकाम केले, तर आत्ता ते नगराध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या बेकायदेशीर बांधकामाला एक प्रकारे संरक्षण मिळाले आहे. इतरांच्या अतिक्रमणांवर कारवाई कशी करणार? नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर वास्तविक त्यांची जबाबदारी शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे पाडण्याची असताना त्यांनी स्वतःच अतिक्रमण केले असल्यामुळे त्यांना आता तो नैतिक अधिकार मिळत नाही. केंद्र सरकारने सागरी पर्यावरण व सागरी किनारा क्षेत्रात अतिशय कडक नियम केले आहेत. १९८६ चा याबाबतचा कायदा कठोर असतानाही माच्छी यांच्या बाबतीत मात्र या कायद्याची अंमलबजावणी करून त्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे धाडस कोणी दाखवत नाही. माच्छी यांनी हे बांधकाम २०२३ मध्ये केले आहे. त्या वेळी ते नगरसेवक होते. पूर्वपरवानगी न घेता पक्के बांधकाम या बांधकामाविरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नगरपालिकेचे विभागीय निरीक्षक अविनाश भोईर यांनी या पक्क्या बांधकामाची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल मुख्याधिकाऱ्यांना दिला होता. त्यात नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम केल्याचे नमूद करण्यात आले होते. माच्छी यांनी नगरपालिका नियमाच्या १६ आणि ४४ तसेच अन्य अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे. नगरविकासऐवजी महसूलकडून चौकशी व्हावी या प्रकरणात नगरविकास मंत्रालयाकडून निपक्षपाती चौकशी होण्याची शक्यता नाही. कारण माच्छी ज्या पक्षातून नगराध्यक्ष झाले, त्या पक्षाचे नेतेच राज्याचे नगर विकास मंत्री असल्यामुळे माच्छी यांच्या बेकायदेशीर आणि अतिक्रमित बांधकामाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी, अशी मागणी फिरोज जमशेदजी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या याचिकेत केली आहे. या परिसरातील बांधकामाबाबत चौकशी करताना तिची ध्वनीचित्रफीत काढण्यात यावी, अशी मागणी ही त्यांनी केली आहे. या याचिकेसोबत त्यांनी यापूर्वीच्या अर्जदाराने केलेल्या तक्रारी, चौकशी समिती, तिचे अहवाल, सागरी नियमन कायद्यांची कलमे, महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमांचे दाखले दिले आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी करून माच्छी यांना नगराध्यक्षपदी राहण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी या याचिकेत फिरोज यांनी केली आहे काय म्हणाले याचिकाकर्ते? डहाणू आणि परिसरातील वेगवेगळ्या गैरव्यवहारा संदर्भात माहिती अधिकार कायद्याचा वापर करून आपण लढा देत असतो. नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी यांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत तसेच सागरी व आणि नगरपालिका नियमांचे उल्लंघन करून केलेल्या बांधकामाबाबतही आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्याबाबतचे पुरावे सोबत जोडले आहेत. माच्छी यांना नगराध्यक्षपदी राहण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी आपण या याचिकेत केली आहे, असे याचिकाकर्ते फिरोज जमशेदजी यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Mar 2026 1:20 pm