Rahata Crime : राहाता हादरले! यात्रेच्या टेंडरवरून नगरसेवकावर रोखलं पिस्तुल; शहरात तणाव
Rahata Crime : यात्रेच्या नियोजनावरून राहात्यात राजकीय वातावरण तापले; नगरसेवक तुपे यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू.
महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरेश्रीमद्भागवत पुराण व विष्णुपुराणानुसार एकदा मनूला शिंका आली, त्यातून एक मुलगा जन्माला त्याचे नाव ईश्वांकू. ईश्वांकूला शंभर पुत्र होते. त्यापैकी विकुक्षी, निमी व दंड हे ज्येष्ठ होते.ईश्वांकूच्या मृत्यूनंतर विकुक्षी राजा झाला. त्याला पुरंजय नावाचा पुत्र होता. तो अतिशय पराक्रमी होता. सत्य युगाच्या शेवटी असुर व देवामध्ये झालेल्या युद्धात देवांचा पराभव झाला. तेव्हा देव विष्णूंकडे गेले व त्यांची प्रार्थना केली. विष्णूने त्यांना पुरंजयच्या नेतृत्वात युद्धाची तयारी करण्यास सांगितले व मी पुरंजयच्या शरीरात प्रवेश करून असुरांचा नायनाट करीन असे वचन दिले. देवांनी त्याप्रमाणे पुरंजयाला विनंती केली असता त्याने ती मान्य केली, मात्र आपण इंद्राच्या खांद्यावर बसून युद्ध करू असे सांगितले. इंद्राने ते मान्य केले. इंद्राने बैलाचे रूप घेतले. पूरंजयने त्यावर आरूढ होऊन असुरांचा पराभव केला. तेव्हापासून पुरंजय ककूत्स्थ म्हणजे खांद्यावर बसणारा या नावाने प्रसिद्ध झाला. कारण कुकुद म्हणजे खांदा म्हणून ककूत्स्थ म्हणजे खांद्यावर बसणारा तसेच इंद्राला वाहन बनविल्यामुळे “ इंद्रवाह’’ म्हणूनही ओळखला जाऊ लागला.याच वंशात पुढे युवनाश्व नावाचा राजा झाला. त्याला संतान नव्हते म्हणून त्याने एका यज्ञाचे अनुष्ठान करविले. ऋषींनी आश्रमात युवनाश्वच्या उपस्थितीत इंद्रदेवतेचा यज्ञ केला. अनुष्ठान व यज्ञाची सांगता झाल्यावर ऋषींनी मंत्रवलेले तीर्थ त्याच्या पत्नीला देण्यासाठी एका कलशात भरून ठेवले. रात्रीच्या वेळी राजाला तहान लागली. ऋषीमुनींना उठवण्याचा त्रास देण्याऐवजी राजा स्वतःच पाणी शोधू लागला. त्याला कलशात असलेले पाणी (तीर्थ) दिसले. त्याने ते प्राशन केले. सकाळ झाल्यावर कलश रिकामा दिसल्याने ऋषींनी चौकशी केली असता त्यांना सत्य घटना कळली; परंतु आता वेळ निघून गेली होती.युवनाश्वाचे पोटात गर्भ वाढू लागला व पूर्ण दिवस झाल्यानंतर तो राजाची कूस फाडून बाहेर आला; परंतु ऋषी व देवाच्या कृपेने राजा जिवंत राहिला व त्याने तेथेच राहून तपश्चर्या करून मुक्ती मिळविली. मुलगा झाल्याबरोबर दुधासाठी रडू लागला. ते पाहून ऋषींनी आता हा कोणाचे दूध पिणार? असे म्हटले तेव्हा इंद्र म्हणाला “मां धाता’’ म्हणजे माझे पिणार असे म्हणून इंद्राने आपली तर्जनी त्याचे तोंडात दिली. ती चाखताच तो एकाच दिवसात वाढ होऊन पूर्ण पुरुष बनला व पुढे मान्धाता या नावाने प्रसिद्ध झाला. मान्धाताचा विवाह बिंदुमती नावाच्या स्त्रीशी झाला. त्याला पुरुकुस्त अंबरीश व मुचकुंद नावाची तीन मुले व पन्नास कन्या होत्या.त्याच काळात सौरभी नावाच्या ऋषींनी एकदा बारा वर्षे पाण्यात राहून तपश्चर्या केली. त्याच पाण्यात एक विशाल मासा आपल्या परिवारासह राहत होता. त्या माशाच्या पुत्र, कन्या, नातवंडे व पणतू यांच्या क्रीडा पाहून सौभरी तपश्चर्या सोडून त्यांच्या क्रिया पाहत असे. त्यामुळे त्याच्या मनातही प्रपंचाविषयी आसक्ती निर्माण झाली. ते राजा मान्धताकडे आले व आपल्याला गृहस्थाश्रमात जाण्याची इच्छा असल्याने व तुझ्या वंशातील पुरुष आणि म्हणून विख्यात असल्याचे सांगून आपल्या एका कन्येचा विवाह आपल्याशी लावून देण्याची विनंती केली.सततच्या तपश्चर्येमुळे सौभरीचे शरीर कृश झाले होते. सौभरीची विनंती ऐकून राजा विचारात पडला. अखेर त्याने सौभरीला सांगितले की, जी मुलगी आपल्याशी लग्न करण्याची ईच्छा व्यक्त करेल तिचे मी आपणा सोबत लग्न लावून देईन. राजाला वाटले यांचे कृषी शरीर पाहून कोणीही तयार होणार नाही. राजाचा हा विचार ओळखून ऋषींनी सेवकासोबत अंत:पुरात प्रवेश करताना अतिसुंदर स्वरूप धारण केले. त्यामुळे सर्वच मुलींना ते रूप आवडले व सर्वच मुली त्यांच्याशी लग्नाला तयार झाल्या तेव्हा राजाने त्या सर्वांचा विवाह थाटात लावून दिला. ऋषींनी विश्वकर्माकडून ५० सुसज्ज महाल बनवून घेतले व त्यांच्यासोबत सुखाने राहू लागला. एक दिवस राजा त्यांच्या भेटीला आला व त्या सर्वांना सुखात पाहून आनंदित झाला.सौभरी ऋषीला दीडशे पुत्र झाले. ते आपल्या संसारात व नातवंडांसह रममाण झाले; परंतु एक दिवस त्यांना अचानक उपरती झाली व विरक्ती आली. आपण एका माशाच्या संसाराकडे पाहून तपश्चर्या सोडून प्रपंचाकडे आकृष्ट झालो, याचा त्यांना पश्चाताप झाला. त्यामुळे त्यांनी सर्व कारभार मुलांकडे सोपवून आपल्या पत्नीसह वानप्रस्थान केले व त्या ठिकाणी तपश्चर्या करून स्वतःला परमार्थात लीन करून घेतले. पतीच्या प्रभावाने त्यांच्या पत्नीही त्याच्यामध्ये लीन झाल्या.
POCSO Case : लग्नाचं आमिष अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी..वाचा सविस्तर
POCSO Case : लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या तरुणाला राहाता जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली २० वर्षांची सक्तमजुरी.
Electric Wire Theft : खटावमध्ये चोरांचा हैदोस! ७ खांबांवरील ७ हजार फूट तार लंपास; शेतकरी संकटात
Electric Wire Theft : चोरट्यांनी तार नेण्यासाठी वापरला टॅक्टर; तक्रार करण्यासाठी फोन केला असता महावितरणच्या शाखा अभियंत्याने मोबाईल केला बंद.
नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरेकर्णमधुर संगीत, आपल्या कलेशी समरस झालेले गायक, अर्थपूर्ण हृदयस्पर्शी गाणी, नयनरम्य चित्रीकरण आणि रसिक सहज गुंगून जातील अशी कथा - ही जुन्या सिनेमाची वैशिष्ट्ये होती. सुरज प्रकाश यांनी दिग्दर्शित केलेला चेतन के. यांचा ‘जब जब फुल खिले’(१९६५) हा असाच एक रम्य सिनेमा! शशीकपूर, नंदाबरोबर बेबी फरिदा, टूनटून आणि आगा होते.रिता खन्ना (नंदा) ही अतिश्रीमंत राजबहादूर चुनीलाल खन्ना (कमलकपूर) यांची एकुलती एक कन्या. सुट्टीसाठी ती सहाय्यक स्टेलाला (शम्मी) घेऊन काश्मीरला जाते आणि राजाकडून (शशीकपूर) एक हौस-बोट भाड्याने घेते. सुरुवातीला थोडी ताणाताणी होऊन नंतर सर्व सुरळीत झाल्यावर मैत्री होते आणि राजा तिच्या प्रेमातच पडतो. पुढच्या वर्षी परत येण्याचे आश्वासन देऊन नंदा परत जाते.इकडे राजबहादूरना तिचे लग्न किशोरशी (जतीन खन्ना) करून द्यायचे असते. (या अभिनेत्यामुळे पुढे हेच नाव असलेल्या अभिनेत्याला गोंधळ टाळण्यासाठी आपले नाव बदलून ‘राजेश खन्ना’ असे करावे लागले.)पुढच्या ट्रीपला किशोर रीताबरोबर येतो आणि राजची पंचाईत होते. घरी परतल्यावर रिता आपले प्रेम राजवर असल्याचे उघड करते तेव्हा वडील आधी राजाला पैशांचे आमिष दाखवून आपल्या मुलीचा नाद सोडण्याचा आग्रह करतात. जेव्हा तो बधत नाही तेव्हा ते तिला खोटीखोटी संमती देऊन दुसरी चाल खेळतात.राजासाठी ते एक पार्टी आयोजित करतात. पार्टीत राजाला रीताचे इतर पुरुषांबरोबर नाचणे खटकते आणि त्यांचे भांडण होते. आपण या संस्कृतीत राहू शकणार नाही असे सांगून तो काश्मीरला परत निघतो.मनात आनंदलेल्या राजबहादुरांचे बोलणे रीताच्या कानावर पडते. त्या दोघांत भांडण व्हावे म्हणून त्यांनीच हा प्रसंग घडवून आणलेला असतो. हे लक्षात येताच चिडलेली रिता तत्काळ राजाला मनवायला रेल्वे स्टेशनवर जाते. गाडी सुटते आणि ती गाडीबरोबर पळत राहते. अगदी शेवटच्या क्षणी राजा तिला वर ओढून घेतो आणि मिठी मारतो. अशी ही सुखांतिका!मूळ शेवट वेगळा होता. मात्र सुरज प्रकाश १९५७ सालच्या ‘लव्ह इन द आफ्टरनून’ या इंग्रजी सिनेमाचा शेवट इतका आवडला होता की, त्यांनी शेवटचा सीन करताना ‘लव्ह इन द आफ्टरनून’ची जशीच्या तशी कॉपी केली आणि सिनेमा हिट झाला! नंदा, शशीकपूरपासून सर्वांच्या बावनकशी अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनाला भिडला. त्या वर्षी सर्वात जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या सिनेमात (६१ वर्षांपूर्वी ५.५ कोटी म्हणजे आजचे ३६७ कोटी) त्याचा क्रमांक दुसरा होता!कल्याण-आनंदजींची सर्व गाणी प्रचंड गाजली. बक्षीजींचे बोल कित्येक वर्षे मनामनात घुमत होते. ‘परदेसीयोसे ना अखिया मिलाना’ने वार्षिक बिनाकात ११वा क्रमांक पटकावला.सिनेरसिकांनी डोक्यावर घेतलेल्या बक्षीसाहेबांच्या त्या अजरामर गाण्याचेशब्द होते -‘परदेसियोंसे ना अँखियाँ मिलाना,परदेसियोंको है इक दिन जाना.’राजाच्या मनातही आपल्यालाही कुणीतरी प्रेमाचे माणूस भेटावे अशी सुप्त इच्छा असते. त्याचबरोबर या प्रवासी लोकांचे प्रेम काही टिकणारे नसते ही जाणीवही असते -‘आती है जब ये रुत मस्तानी,बनती है कोई न कोई कहानी.अबके बरस देखे बने क्या फ़साना,परदेसियोंसे ना..’पर्यटनस्थळी तसे नेहमी घडणारे हे नाट्य! क्षणभराचा संपर्क येतो आणि एखादी व्यक्ती मनाला खूप आवडून जाते. तिच्याविषयी ओढ निर्माण होते पण त्या सहवासाला, संबंधांना काळाच्या मर्यादा पडतात. ती व्यक्ती जाताना खूप हुरहूर लावून जाते आणि हेच जर दोन तरुण मनात, थोड्या जास्त दिवसाच्या सहवासात घडले तर बरीचशी भावनिक गुंतागुंत होऊन बसते आणि वियोगानंतर माणूस स्वत:शीच पुटपुटतो, ‘आता पुन्हा कधी असे कुणाच्या जवळ जाणे नकोच!’अंतर्मन मग नकळत त्या व्यक्तीला दोषही देऊ लागते! वाटते, ‘हे लोक तर मौसमी पक्ष्यांसारखे असतात. आज लळा लावतात आणि उद्या भुर्रकन उडून जातात. यांचे जगणेच बैराग्यासारखे. त्यांच्याशी संबंध नआलेलाच बरा!’‘सचही कहा है पंछी इनको,रातको ठहरें तो उड़ जाएं दिनको.आज यहाँ, कल वहाँ है ठिकाना,परदेसियोंसे ना...’हे किती स्वार्थी असतात ना? जेव्हा जेव्हा वसंताचा बहर येतो तेव्हा बरोबर हजर होतात आणि पानगळ सुरू झाली की कुठे गायब होतात देव जाणे! मग त्यांना जीव लावणाऱ्याने वियोगातले दिवस कसे काढायचे?‘बागोंमें जब-जब फूल खिलेंगे,तब-तब ये हरजाई मिलेंगे.गुज़रेगा कैसे पतझड़का ज़माना,परदेसियोंसे ना...’विरह जेव्हा कायमचा आहे हे कळते तेव्हा दुखावलेले मन एकेक फिर्याद करू लागते - या अशा प्रवाशांना प्रेमाशी काही देणे-घेणेच नसते, बहुतेक! यांची मने कशी दगडासारखी निष्ठुर असतात. यांच्यासाठी कधीच रडू नये. हे तर कुणासाठी दोन अश्रूही ढाळत नसतात.‘प्यारसे अपने ये नहीं होते,ये पत्थर हैं ये नहीं रोते.इनके लिये ना आँसू बहाना,परदेसियोंसे ना...’प्रेमाच्या मनाला मोहून टाकणाऱ्या भावनेचा सुंगध यांना काय कळणार? ही तर कागदाची फुले! हे कधी कुणाच्या प्रेमात मनापासून बरसतात का? खरेच यांच्याशी नाते जोडूच नये!‘ना ये बादल ना ये तारे,ये कागज़के फूल हैं सारे.इन फूलोंके न बाग लगाना,परदेसियोंसे ना...’नायकाच्या मनातील नेमक्या भावना हळुवारपणे व्यक्त करणे हा तर जुन्या गाण्यांचा हेतूच असायचा. राजा हा एक भोळाभाबडा तरुण. तो स्वत:ची वेदना सांगताना म्हणतो, ‘मी हीच चूक केली होती. एका परक्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो होतो. आज माझे हृदय सतत अश्रू ढाळताना मला सांगत राहते – कुणा परक्यांशी कधीच संबंध ठेवू नकोस -‘हमने यही इकबार किया था,इक परदेसीसे प्यार किया था.रो-रोके कहता है दिल ये दीवाना,परदेसियोंसे ना...’परमेश्वराच्या या पृथ्वी नावाच्या सुंदर पर्यटनस्थळाला भेट देणारे तसे आपणही परदेशीच की! मग ती भेट भले ६०/७० वर्षांसाठी का असेना! त्यामुळे संतांनी म्हटल्याप्रमाणे इथेही जास्त मन गुंतवण्यात अर्थ नाही, हेच खरे.
स्मृतिगंध; लता गुठेमी वयाच्या १७ व्या वर्षी मुंबईत आले आणि या सिमेंटच्या जंगलात माझी कर्मभूमी निर्माण केली. पण इथं कधी तसं मन रमलंच नाही. आजही सण उत्सव आले की, माझं मन गावच्या बालपणीच्या कोवळ्या पाऊलवाटेने धावत सुटतं. नुकताच होळीचा सण झाला आणि मला आठवला तो बालपणातील शिमग्याचा सण.फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरी होणारी होळी आणि त्यानंतर येणारी धुळवड–रंगपंचमी यांना एकत्रितपणे अनेक गावांत शिमगा असे म्हटले जाते. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील खेड्यांमध्ये शिमगा विशेष जल्लोषात साजरा केला जातो.शिमग्याचा सण जवळ आला की आई शेणाच्या गाेवऱ्या लावायला घ्यायची. छान हाताने थापलेल्या वाळलेल्या गोवऱ्या व होळीला लागणारे सामान आदल्या दिवशीच जमा करून ठेवायचो. दुसऱ्या दिवशी अंगणभर शेणाचा सडा टाकायचा. बरोबर अंगणात मधोमध एक छोटासा खड्डा करून त्या भोवती छान रांगोळी घालायची हे काम आम्हा मुलांकडेच असायचे. घरातल्या मोठ्या बायका पुरणपोळीचा स्वयंपाक करण्यामध्ये गुंतलेल्या असायच्या. चुलीवर रटरटणारं पुरण शिजल्यानंतर त्याचा सुगंध घरभर पसरायचा. सूर्य मावळायच्या वेळेला आजूबाजूचे, शेजारचे सर्व अंगणात जमा व्हायचे. मग अंगणात होळी पेटवली जायची. अतिशय मनोभावे त्या होळीची पूजा व्हायची. त्यामध्ये नारळ, पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जायचा. होळीभोवती तांब्यातील पाणी ओतत बायका प्रदक्षिणा घालायच्या. त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटून. भक्त प्रल्हाद आणि होलिकाची कहाणी लहान मुलांना ऐकवली जायची आणि त्यानंतर गावांमध्ये दोन वेशीच्या बाहेर दोन मोठ्या गावच्या होळ्या पेटवल्या जायच्या. गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत होळी उभारण्याची तयारी दिवसभर सुरू असायची. सुक्या फांद्या, उंच बांबू, वैरणीच्या पेंढ्या आणि गावातल्या प्रत्येक घरातून आलेल्या पाच गोवऱ्या त्याभोवती रचल्या जायच्या आणि उंच होळीची बांधणी केली जायची. त्याला हार घालून, साखरेच्या घाट्या अडकवल्या जायच्या. ही तयारी करताना प्रत्येक घरातून काही ना काही नैवेद्य होळीमध्ये अर्पण केले जायचे. विधीपूर्वक होळी पेटवली जायची. स्त्रिया होळीत नव्या पिकाचे धान्य अर्पण करतात. या विधीमागे वाईट प्रवृत्तींचा नाश आणि सद्भावनेचा विजय अशी भावना असते.पुराणकथेनुसार भक्त प्रल्हादाचा विजय आणि होलिकेचा पराभव याची आठवण करून देणारा हा क्षण असतो. अशा सण उत्सवामधूनच गावातील सामुदायिक एकतेची भावना दिसून यायची. दुसऱ्या दिवशी धुळवड. रंगपंचमीला ग्रामीण भागात धुळवड असे म्हणतात. धुळवडीचा रंग तयार करण्यासाठी पूर्वी पळसाची लाल भडक फुलं तोडून आणायचो ते वाटायची आणि त्यापासून रंग तयार करायचा. अगदी नैसर्गिक आणि दिसायलाही अतिशय सुरेख. पूर्वी रासायनिक रंग नव्हते; फुलांपासून, हळदीपासून, मातीपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरले जात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण एकमेकांना रंग लावून शिमग्याचा जल्लोष साजरा करायचे. या काळामध्ये शेतीची कामे संपत आलेली असायची त्यामुळे थोडी उसंत मिळाल्यामुळे घरोघरी हा सण उत्साहात साजरा व्हायचा. या काळामध्ये गावामध्ये वेगवेगळे रूप घेऊन बहुरूपे गावभर फिरायचे. रायरंद पोलिसाचे कपडे घातलेला अजूनही आठवतो. म्हणूनच ‘शिमग्याचे सोंग’ हा शब्दप्रयोग आला असावा. अनेक भागांमध्ये लोकनाट्य सादर होत असत. कोकणात “शिमगा नाच” प्रसिद्ध आहे. माणसं राक्षस, राजा-राणी, वाघ, पोलीस, भिकारी अशी विविध सोंगे घेऊन ढोल, ताशा, झांज यांच्या तालावर नाचत गावभर शिमगा मागायचे आणि त्यांना शेतकरी मोठ्या आनंदाने दान म्हणून झोळीत जे शक्य असेल ते घालायचे. हे सोंगाडे सामाजिक प्रश्नांवर उपरोधिक भाष्यही करत असत. समाजातील वाईट चालीरिती, अंधश्रद्धा यावर लोकांना समजेल उमजेल या शब्दांत टीका करत असत. ही लोकजागृतीची एक विलक्षण आकर्षित करणारी पद्धत होती.शिमग्याच्या सणामध्ये स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असे. होळीच्या दुसऱ्या दिवशी गावातील स्त्रिया होळीतील रक्षा आणण्यासाठी एकत्र जमत असत. त्यावेळी होळीभोवती स्त्रिया फेर धरून ओव्या म्हणत, फुगड्या खेळत आणि पारंपरिक गाणी गात शिमग्याचा आनंद द्विगुणित करत. घराघरांत पुरणपोळी, करंजी, लाडू असे गोड पदार्थ बनवले जात. नातलग आणि पाहुण्यांचे आदरातिथ्य केले जायचे. त्यामुळे शिमगा हा नातेसंबंध दृढ करणारा सण होता. वर्षभर शेतात राबणारे शेतकरी यांच्यासाठी खरंतर हा सण म्हणजे वर्षभराच्या श्रमानंतर मन मोकळे करून हसण्याचा, नाचण्याचा आणि गाण्याचा सण होता. आज सगळंच बदललं आहे. गावातील बहुतेक कुटुंब शेतामध्ये राहायला गेल्यामुळे गावाचं गावपण पूर्णपणे नाहीसं होत चाललं आहे. आता हे सण-उत्सव म्हणजे फक्त परंपरा आणि सोपस्कार म्हणून राहिले आहेत. आज गावात गेलं की एक उदासलेपण जाणवते. पूर्वीच्या फक्त आठवणी राहिल्या आहेत. बदलत्या काळाबरोबर बरंच काही प्रवाह बरोबर वाहून गेलं आहे. अजूनही मनात वाटतं हे सगळं जपून ठेवायला हवं.
Kuruli Land Fraud : कुरुळीत जमिनीचा मोठा ‘खेळ’! महिलेच्या बनावट सह्या करून १ कोटींचे कर्ज लाटले
Kuruli Land Fraud : कुरुळी येथील गट क्रमांक १४४/३ मधील सामाईक जमिनीवर मालकाची संमती नसतानाही श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेतून उचलले १ कोटींचे कर्ज.
Eklahare Theft : एकलहरे येथील शाहमदार बाबा दर्ग्यात अज्ञात समाजकंटकांचा हैदोस; दानपेटी फोडून रोकड लांबवली, तर वीज उपकरणांची दगडाने केली तोडफोड.
Women Day 2026 : कळी उमलू लागलीये...
मनोगत; साक्षी माने‘स्त्री’ हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर उभी राहते ती, तिची अष्टपैलू रूपं आणि तिच्या अस्तित्वासाठी तिनं दिलेला प्रदीर्घ लढा. आज जग बदलतंय, संस्कृती बदलतेय. पुरुषप्रधान मानसिकतेकडून आपण समानतेच्या दिशेने वाटचाल करतोय. आजची स्त्री केवळ तिचं ‘स्वत्व’ जपण्याचा प्रयत्न करत नाहीये, तर अनेक वर्षांच्या बंधनांनंतर ‘बाईपणा’चा कुठे तरी मोकळा श्वास घेऊ पाहतेय. या काळात तिनं कशा स्वरूपात स्वतःला समाजात सामावून घेतलं आणि भविष्यात तिची काय भूमिका असेल? याविषयी घेतलेला हा वेध.जग बदलतंय! पण त्याहूनही अधिक वेगाने बदलतंय ते मानवी दृष्टिकोनाचं क्षितिज. शतकानुशतके स्त्रीच्या भोवती आखलेली संकुचित विचारांची वर्तुळं आता धूसर होऊ लागलीये. हा बदल एका रात्रीत झालेला चमत्कार नाही, तर तो ‘ती’च्या अस्तित्वासाठी तीनच दिलेला एक प्रदीर्घ आणि जाणीवपूर्वक लढा आहे.या प्रवासाची वाट कालही सोपी नव्हती; ना आजही ती फुलांनी सजलेलीये. वाटेत आजही आव्हानांचे डोंगर उभे आहेत आणि बोचणारे काटेही. पण प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य गोष्टींनाही शक्य करण्याची किमया तिनं साधलीये. इथं मुद्दा ‘स्त्री महान की पुरुष’ अशा निरर्थक वादाचा किंवा स्पर्धेचा अजिबात नाही; तर मुद्दा आहे तो फक्त समानतेच्या अथांग आकाशात स्वतःच्या पंखांनी मुक्तपणे विहरताना तिच्यात घडत गेलेल्या परिवर्तनाचा! हा बदल केवळ तिच्या पेहरावात किंवा वागणुकीत झालेला नसून, तो तिच्या आत्मविश्वासात आणि वैचारिक बैठकीत झाला.”आज प्रत्येक क्षेत्रात ‘ती’चा केवळ वावरच नाही, तर तिचा अधिकार आणि सन्मानही तितक्याच प्रकर्षाने उमटतोय. पिढ्यानपिढ्यांचा वारसा सोबत घेऊन आजची स्त्री खांद्याला खांदा लावून प्रगतीचं शिखर गाठतेय. कधीकाळी ‘डोक्यावरचा पदर’ हेच तिचं सर्वस्व मानलं जायचं, पण आज तो पदर सावरत, कोणासमोरही न डगमगता डोळ्यांत डोळे घालून आपली परखड मतं मांडू लागलीये.चूल आणि मूल या मर्यादित विश्वाच्या सीमा ओलांडून ती आज जगाच्या व्यासपीठावर उभी आहे, पण हे करत असताना तिच्यातील ‘स्त्रीत्व’ आणि कर्तव्याची जाणीव तसूभरही कमी झालेली नाही. घरासाठी, आपल्या माणसांसाठी आणि समाजासाठी असणारी तिची निष्ठा आजही तितकीच अखंड आहे. स्वतःच्या आगळ्यावेगळ्या शैलीचा वापर करून काहीतरी वेगळं करून दाखवण्याची समज कदाचित सुरुवातीला नव्हती, पण एकदा का ही जाणीव तिच्या मनात रुजली, मग मात्र ती थांबली नाही. तिने केवळ थांबणं नाकारलंच नाही, तर नवनवीन क्षितिजं आजमावून पाहणं स्वीकारलं. तिच्या याच साहसातून आणि अनुभवातून, ‘मुलींनी उंबऱ्याच्या आतच राहावं’ हे जुनं समीकरण तिने कायमचं खोडून काढलं.पूर्वीच्या आणि आजच्या स्त्रीच्या जगात जमीन-अस्मानाचा फरक पडला असला, तरी एक गोष्ट आजही काळाच्या प्रवाहात स्थिर आहे, ती म्हणजे तिचं ‘भावनिक विश्व’. पूर्वीची स्त्री भावनांच्या ओझ्याखाली स्वतःला हरवून घेणं किंवा हार मानणं स्वीकारत होती; पण आजची स्त्री त्याच भावनांना व्यक्त करण्याच्या नव्या वाटा शोधू लागलीये.आज समाजात घटस्फोटांचं वाढतं प्रमाण, लग्नानंतरचे बाह्य संबंध, स्त्रियांच्या ठाम आणि प्रसंगी कठोर भूमिका किंवा अगदी सहजपणे वाढलेली व्यसनाधीनता यांसारख्या गोष्टी सर्रास दिसू लागल्यात. हे सारं पाहून काहींच्या भुवया उंचावतात, पण त्यामागे तिची निवड, तिचं कुतूहल किंवा कदाचित तिची गरजही असू शकते. खरं तर माणसाने व्यक्त व्हावं असं आपण मानतो, पण स्त्रीच्या बाबतीत ही अभिव्यक्ती जेव्हा पारंपरिक चौकटी मोडते, तेव्हा समाज चक्रावून जातो. तिच्या हातातली सिगारेट किंवा तिच्यासोबत असणारा प्रियकर, मित्र आजही आश्चर्याचा धक्का देतो. इथे कोणत्याही व्यसनाचं, प्रेम संबंधांचं समर्थन करण्याचा उद्देश नाही, कारण तो पूर्णतः वैयक्तिक निवडीचा भाग आहे; पण प्रश्न आहे तो तिच्या कोंडलेल्या भावनिक विश्वाचा.पूर्वी या भावना मांडण्यावर सामाजिक दबावाचं ‘दडपण’ असायचं, पण काळ बदलला आणि भावना व्यक्त करण्याचं माध्यमही! आपल्या आनंदासाठी किंवा जगण्याच्या संघर्षातून मार्ग काढण्यासाठी एखादा रस्ता निवडण्याचा हक्क हा वैयक्तिक आहे. आजची स्त्री हा हक्क केवळ ओळखत नाही, तर तो निर्भीडपणे स्वीकारतानाही दिसतेय. हा बदल कदाचित अनेकांसाठी स्वीकारणं कठीण असेल, पण तिच्या बदलत्या मानसिकतेचा आणि अस्तित्वाच्या संघर्षाचा हा एक अपरिहार्य पैलू आहे.“हे सारं घडतंय, बदलाचे वारे वाहतायत आणि जाचक अटींची कोडीही हळूहळू सुटतायत; पण एक प्रश्न आजही अनुत्तरित आहे, तो म्हणजे - स्त्रियांच्या सुरक्षेचा तिढा! पिढ्या बदलल्या, जग आधुनिक झालं, पण ज्या ‘सुरक्षेच्या कवचाची’ तिला आस होती ती आस आजही अधांतरीच आहे. अजूनही गर्दीतल्या त्या ‘वाईट नजरा’ तिला बोचत राहतात आणि रस्त्यावरून चालताना घड्याळाचे काटे तिला वेळेच्या मर्यादेची भीतिदायक जाणीव करून देत राहतात.कधीकधी निवडलेल्या क्षेत्रातील काही अटी तिच्या स्वप्नांची पायमल्ली करतात. पण सर्वात मोठं दुर्दैव हे की, या प्रगत शतकातही ‘मुलगी जन्माला नको’ म्हणून केवळ पुरुषच नाही, तर घरातील स्त्रियाही देवाकडे साकडं घालतात. इथे प्रश्न उभा राहतो, ‘स्त्रीच स्त्रीची शत्रू आहे का?’... पण सखोल विचार केला तर लक्षात येतं की, हे शत्रुत्व नसून आपल्या पोटच्या मुलीला या असुरक्षित जगाच्या वेदनांपासून वाचवण्याची ती एक केविलवाणी धडपड आहे.ज्या दिवशी आपल्या घरातील प्रत्येक ‘ती’ समाजातल्या या विकृत प्रवृत्तींवर मात देऊन विजयाची गुढी उभी करेल, त्याच दिवशी खऱ्या अर्थानं स्त्री-भ्रूणहत्या आणि असुरक्षिततेचा अंधार कायमचा नाहीसा होईल. जन्माला येणाऱ्या प्रत्येक कळीला आता मुक्तपणे फुलायचंय अन् फुलपाखराला गगनभरारी घ्यायचीय... गरज आहे ती या मार्गातील अडथळा न होता, तिचं ‘सारथी’ बनण्याची!मात्र या सर्व स्थित्यंतरांच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण भविष्यातील स्त्रीकडे पाहतो, तेव्हा एक आश्वासक चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. भविष्यातली स्त्री ही केवळ ‘पुरुषांच्या बरोबरीने’ चालणारी नसेल, तर ती स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाचा सूर्य असेल. येणाऱ्या काळात ती स्वतःच्या आवडी-निवडी, निर्णय आणि चुकांची जबाबदारी घेण्यास पूर्णपणे सक्षम असेल.या बदलांमुळे तिच्या आयुष्यात एक मोठी सकारात्मकता येणार, ती म्हणजे ‘मानसिक स्वातंत्र्य’. स्वतःला सिद्ध करण्याच्या दडपणाखाली न वावरता, ती स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्यायला शिकेल. उद्याच्या समाजात ‘ती’ केवळ एक सून, मुलगी किंवा पत्नी या नात्यांच्या पलीकडे जाऊन एक प्रगल्भ ‘माणूस’ म्हणून तिची ओळख असेल. तिच्या या भावनिक प्रगल्भतेतून आणि अनुभवातून एक असा समाज घडेल, जिथे संवाद मोकळा असेल आणि प्रत्येक व्यक्तीला - मग ती स्त्री असो वा पुरुष - स्वतःच्या अटींवर जगण्याचं स्वातंत्र्य मिळेल.स्त्रीच्या या बदलत्या प्रवासाचा हा ‘वेध’ म्हणजे केवळ तिच्या संघर्षाची गाथा नाही, तर तो एका नव्या युगाच्या पहाटेची आशा आहे. ‘ती’ बदलली आहे, ‘ती’ बदलत आहे आणि हीच बदलाची लाट उद्याच्या सुंदर जगाची पायाभरणी करण्यात मोलाचा वाटा ठरेल यात शंकाच नाही.
स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईरआजूबाजूला घडणाऱ्या असंख्य घटनांची अनेक स्पंदनं मनात उमटत असतात. एखादं दृश्य नजरेच्या टप्प्यात येतं, मेंदूपर्यंत पोहोचतं यावर काहीतरी प्रतिक्रिया मनात उमटत असते न असते तोपर्यंत दुसरंच काहीतरी येऊन मनावर आदळतं. जे मनाला सुखावणारं आहे, दुखावणारं आहे, ते पचवण्याइतकी देखील फुरसत मिळत नसते.आजूबाजूच्या धावत्या-पळत्या जगाबरोबर खरं तर प्रत्येकाचीच ही रस्सीखेच सुरू असते, इतका वेग आज काळाने पकडला आहे. लहानपणी मी आणि माझा भाऊ आजोळी माझ्या मामाघरी विरारला यायचो. आम्ही राहायला मुंबईत होतो, पण तेव्हाची मुंबई इतकी पळणारी नव्हती... थोडी संथ, लय तेव्हा मुंबईतल्या जीवनातही होती. छान शेजारपाजारी येणं-जाणं असायचं, निवांतपणे गप्पा व्हायच्या, सुट्टीच्या दिवशी पाहुण्यांचे येणं-जाणं असायचं... असो. पण मी सांगत होते विरारच्या मामाघरची आठवण. तेव्हाचं विरार तर मुंबईपेक्षाही खूप शांत आणि संथ होतं. आजूबाजूला फुलांच्या, भाज्यांच्या वाड्या दिसायच्या... उन्हाळ्याच्या दिवसात मिळणारा रानमेवा... ही तर आमच्यासाठी धमालच असायची... पण आम्हाला खरी गंमत वाटायची ती सुसाट धावणाऱ्या राजधानीची.संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान सुसाट राजधानी दिमाखात स्टेशनाला मागे सोडून निघून जायची. मामाघरी असताना एकही दिवस न चुकवता आमचा गच्चीवर जाऊन सुसाट धावणारी राजधानी पाहण्याचा कार्यक्रम असायचा, इतकं आम्हाला त्या वेगाचं आकर्षण वाटायचं. राजधानीच्या हॉर्नचा आवाज, रुळावरची राजधानीची धडधड सगळ रोमांचकारी वाटायचं.खरं तर आम्ही मुंबईत जिथे राहायचो तिथे समोरच आम्हाला विमान उडताना, उतरताना अगदी घराच्या खिडकीत बसूनही दिसायची. विमान येता जातानाचे मोठाल्ले आवाज, जे इतरांना मोठाल्ले वाटायचे पण कान बसवणारा तो भलामोठा आवाज सवयीमुळे आम्हाला कधीच मोठा वाटला नव्हता. पण तोच राजधानीचा हॉर्न आणि रुळावरचा गाडीचा आवाज अगदी आमच्या कानांमधून आरपार जायचा. कसं असतं ना मनाच्या सवयीचं. रोज रोज ज्या गोष्टी आपण पाहतो, अनुभवतो ते आपल्या इतकं अंगवळणी पडतं की त्या गोष्टीबद्दलच्या आपल्या संवेदनाच हरवून जातात. आता अगदी काल परवाचीच गोष्ट असेल. संध्याकाळच्या वेळेस सोसायटीच्या खाली असलेल्या बाकावर थोडा वेळ निवांतपणे बसले होते. तसं आता संध्याकाळच्या वेळेस ‘हमारे जमाने मे था’ अशी मुलं खेळताना दिसत नाहीत. ट्युशन, इतर क्लासेस आणि नाहीच राहता राहिलं तर मोबाइल वेड... यामुळे कवी गुलजार म्हणतात त्याप्रमाणे - ‘एक मोबाइल मेरी गेंद चुरा ले गया है’ ही वस्तुस्थिती मुलांच्या खेळण्याची आहे, तर मला दोन लहान मुलं खेळताना नजरेस पडली. साधारणतः तिसरी, चौथीतील असतील. दोघंच जण कसला खेळ खेळतायत म्हणूनच अधिक कुतूहलाने मी त्यांच्याकडे मधे भिंत असल्याने थोडं वाकूनच पाहू लागले. दोघं जण तोंडाने ढूम्म...ढोम्म असे काहीसे आवाज काढत होते आणि एकमेकांच्या अंगावर लपूनछपून कागदाचे बोळे टाकत होते. बराच वेळ त्यांचा खेळ मी पाहत होते. ते काय करत आहेत याचा अंदाज मला आला होता. तरी पण मुलं काय उत्तर देतायत, हे पाहू या... म्हणून मी त्या दोघांजवळ गेले आणि त्यांना विचारलं,“काय खेळताय तुम्ही दोघं?” तर ती दोघं जण माझ्याकडे पाहून हसत हसतच म्हणाली,“अांटी आम्ही वॉर वॉर खेळतोय.” “काय?” मी म्हटलं कोणी सांगितला तुम्हाला हा खेळ ,” अांटी कोणी नाही सांगितला. अांटी टीव्हीवर न्यूजमध्ये बघूनच आम्हाला ही आयडिया सुचली. कसे बॉम्ब पडतायत... सारखा सायरनचा आवाज कसा येतोय. मज्जा येते बघायला. घरात आमचं कार्टून पण कोणी लावत नाही... अख्खा दिवस फक्त न्यूज चॅनल.“मी त्या मुलांना म्हटलं, “भीती नाही का वाटत वॉरच्या बातम्या बघायला.” “पहिल्यांदा वाटली होती. विमान डोक्यावरून जाताना दिसलं तर वाटायचं आता आपल्या डोक्यावर नाही नं बॉम्ब पडणार. घरात सगळे मला चिडवायचे घाबऱ्या... घाबऱ्या. पण आता बातम्या सारख्या सारख्या पाहून भीती निघून गेली. मी ब्रेव झालो.”त्याच हे वाक्य ऐकून मी सुन्न झाले. कशी समजावू मी या लहानशा मुलाला, सवयीने मन गेंड्याच्या कातडीसारखं संवेदनाहिन होणं आणि शूरता यातला फरक... याच्यासारखी असंख्य मुलं असतील जी रोज रोज न्यूज चॅनलवरील बातम्या रात्रंदिवस बघत असतील... माणसांच्या मरणाच्या... एकमेकांना भोसकण्याच्या... सतत तेच तेच ऐकून ऐकून एक संवेदनाशून्य “शूर पिढी” तर तयार होत नाही ना... ज्याचं समरगीत अभिमानाने छाती फुलवणारं असेल की, माना टाकणारं असेल हाच प्रश्न राहून राहून मनात उमटत होता. आंतरराष्ट्रीय युद्धापेक्षाही मला जास्त काळजी वाटू लागली, या लहान लहान मुलांची. युद्ध ही घटना त्यांच्यापर्यंत ज्या पद्धतीने पोहोचत आहे, त्यातून त्याचं या घटनेकडे पाहण्याचं एक चुकीचं आकलन तर तयार होत नाही ना, याचा विचार करायला हवा. अगदी आपण सगळेच लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणं कशी परतवून लावली, युक्तीने आणि शौर्याने युद्धं कशी जिंकली याच्या गोष्टी समरस होऊन वाचायचो, ऐकायचो; त्यातून प्रेरणा घ्यायचो. पण त्या गोष्टी वाचताना वा ऐकताना कुठेही संवेदनाहिन न होता उलटपक्षी आपल्या मनात संवेदना जागृत व्हायच्या. देशप्रेम, आपल्या मातृभूमीचा सन्मान आणि नैतिक मूल्ये कळत नकळत मनात पेरली जायची.पण आज युद्ध आपल्या लहान मुलांपर्यंत कशाप्रकारे पोहोचत आहे, कोवळ्या मनांवर त्याचे काय पडसाद उमटत आहेत ही खरच चिंतेची बाब आहे. याला वाहिन्या जबाबदार आहेत असे नव्हे. ते त्यांचे व्यावसायिक काम पार पाडत आहेत आणि म्हणूनच जबाबदारी वाढते, ती तुमच्या आमच्यासारख्या पालकांची. युद्ध मग ते कोणत्याही कारणासाठी झालेले असो. मागे ठेवून जातं असंख्य निष्पाप प्राणांचे आक्रोश आणि पुन्हा पुन्हा अधोरेखित करत ते मानवतेचा, प्रेमाचा संदेश.‘युद्धस्य तू कथा रम्य’ असं एक सुभाषित आपण नेहमी वापरतो. युद्धाच्या कथा आपल्याला ऐकायला खूप सुरस, उत्कंठावर्धक वाटतात. पण इथे पण येतोच... प्रत्यक्ष युद्धभूमीवर घडणारा घटनाक्रम आणि त्याच्या कथा यात फरक असतो, असा अर्थ हे सुभाषित सुचवते.अगदी कुरुक्षेत्रावर अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी झालेल्या युद्धानंतर विजयी ठरलेल्या पांडवांनाही आनंदापेक्षा घडलेला नरसंहार मनाला यातना देणारा होता. असे अनेक दाखले आपल्याला इतिहासात सापडतात. हॅनाची सुटकेससारख्या पुस्तकातून दुसऱ्या महायुद्धात पंधरा लाख लहान मुलांचे आयुष्य संपवणाऱ्या ‘हॉलोकॉस्ट’(दुसऱ्या) महायुद्धाच्या काळात हिटलर व त्याचा नाझी पक्ष यांनी जो नरसंहार केला त्याला हॉलोकॉस्ट म्हणतात. माणसाच्या इतिहासातील सामूहिक हत्यांची ही सर्वात भयंकर घटना होती. आपण वाचतो तेव्हा आपल्या डोळ्यांत अश्रू उभे राहतात. या गोष्टीचा शेवट आपल्याला सांगून जातो, की युद्ध नको, शांतता आणि प्रेमच जगाला मानवकल्याणाकडे नेऊ शकतात. युद्धाची गोष्ट जेव्हा आपल्यापर्यंत आणि विशेषतः मुलांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचते, तेव्हा मनात सद्भावाच्या संवेदना निर्माण करते, पण तिच गोष्ट जेव्हा चुकीच्या पद्धतीने पोहोचते तेव्हा मनावर ओरखडे उमटतात, हे आपल्याला लहान मुलांच्या अनेकविध कृतींमधून जाणवते. जगात कुठेतरी युद्ध सुरू असताना काय चाललंय हे जाणून घेणं ही मानवी मनातील उत्सुकता आहे. बातम्यांच्या माध्यमातून या उत्सुकतेचं समाधानही होतं, पण सततच्या भडीमाराने कोवळी मनं सहजसुंदर राहण्याऐवजी निष्ठुर तर होणार नाहीत ना, याची काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. कारण ही लहान मुलं म्हणजे जगाला मानवता, शांती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या भारतीय संस्कृतीचं भविष्य आहेत, ज्याची मशागत आपल्याला आजच करायची आहे. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, जो आपण सर्वांनी उत्साहाने मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला. कुसुमाग्रजांच साहित्य हे मराठी भाषेचं वैभव आहे. त्याही पलीकडे जाऊन सांगायचं, तर कुसुमाग्रजांची कविता मानवतेची कास धरणारी कविता आहे, याचा प्रत्यय आपल्याला त्यांची कविता वाचताना ठायी ठायी येतो.‘प्रेम कुणावर करावं ’ या सुप्रसिद्ध कवितेत कुसुमाग्रज म्हणतात – प्रेम आहेमाणसाच्या संस्कृतीचा सारांशत्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणिभविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव...!प्रेम ही भविष्यकाळातील अभ्युदयाची एकमेव आशा आपल्याला मुलांच्या मनात पेरायची आहे, जी या जगात कोणतंच ‘हॉलोकॉस्ट’ घडूदेणार नाही.ashwinibhoir23@gmail.com
Leopard Trapped : जुन्नरमध्ये अजबच घडलं! खानगावात एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे जेरबंद; वनविभागही अवाक
Leopard Trapped : खानगाव येथील शेतात वनविभागाच्या पिंजऱ्यात दीड वर्ष वयाचे नर आणि मादी बिबटे अडकले; जुन्नर वनविभागाची मोठी कारवाई.
Women Day 2026 : भावविश्वातील अबोल परिवर्तन
चिंतन; डॉ. नीना सावंतभारतीय स्त्रीच्या प्रवासाबद्दल आपण अनेकदा संसार, शिक्षण, नोकरी, राजकारणातील सहभाग किंवा नेतृत्व या टप्प्यांतून बोलतो. पण या दृश्यमान बदलांच्या पलीकडे एक अधिक खोल आणि शांत परिवर्तन घडले आहे - तिच्या भावविश्वात.सहनशीलतेतून संवादाकडे, कर्तव्यापासून निवडीकडे आणि मौनातून स्व-अभिव्यक्तीकडे - भारतीय स्त्रीच्या मनोविश्वाचा प्रवास अनेक पिढ्यांतून घडत आला आहे. त्याबरोबर समाजातील होणारे बदल सुद्धा तिने स्वीकारले आणि स्वतःला घडवले.सहन करणारी पिढी/आजीची पिढी (१९४० च्या दशकात जन्मलेली) विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जन्मलेल्या स्त्रियांचे आयुष्य कुटुंब, विवाह आणि कर्तव्य यांच्या चौकटीत बांधलेले होते. भावना दडपणे ही ताकद मानली जात होती. त्याग हा गुण होता. वैयक्तिक इच्छेपेक्षा कुटुंबाच्या गरजा महत्त्वाच्या होत्या. मी माझ्या आई, अाज्जी, मावशी इत्यादी ना बघत बघत वाढले आणि माझ्या मनात कधी नाही आले की आईने स्वतःसाठी काही करायला पाहिजे. त्या सर्वांनी घरी असणे हीच समज. ही पिढी सहन करणारी होती. कुटुंबासाठी सगळे काही करणारी होती आणि स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी होती. या पिढीत संघर्ष नव्हता असेही नाही. आपण सावित्रीबाई फुले यासारख्या विद्वान महिलेचे समाजाच्या विरोधाला सामोरे जात मुलींच्या शिक्षणाचा पाया कसा रचला हे बघितले,ज्यामुळे आज आपल्या सर्वांना शिक्षण मिळाले तसेच इंदिरा गांधींनी पुरुषप्रधान राजकारणात देशाचे नेतृत्व केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास होता, पण तो संयमित आणि स्थिर स्वरूपात व्यक्त झाला.या पिढीने प्रचंड सहनशक्ती विकसित केली. अनेक स्त्रियांनी आपले दुःख आतमध्येच ठेवले. त्यांची ओळख नात्यांमधून घडत होती - मुलगी, बहीण,पत्नी, आई.मुंबईतील ८२ वर्षांच्या एका आजी सांगतात,“आम्ही ‘मला काय हवं आहे?’ असा विचारच केला नाही. ‘घराला काय हवं आहे?’ हेच आमचं समाधान होतं. माझ्या वाटेचा घास माझ्या बाळाला मिळाला, त्यातच माझी भूक मिटली.”या पिढीतील अनेक स्त्रियांसाठी लैंगिकता ही विवाह आणि मातृत्वाशी घट्ट जोडलेली होती. भावनिक जवळीक अनेकदा वर्षानुवर्षांच्या सहजीवनानंतर हळूहळू विकसित होत असे. संयुक्त कुटुंबांमध्ये गोपनीयता जवळजवळ नव्हती आणि एखाद्या स्त्रीने स्वतःच्या लैंगिक इच्छांविषयी उघडपणे बोलणे हे जवळजवळ अकल्पनीय मानले जात असे.“अशा गोष्टींबद्दल आम्ही कधी बोलतच नव्हतो. लग्न म्हणजे जबाबदारी. प्रेम आणि समजूत नंतर आली - आली तर.”समतोल साधणारी पिढी/आईची पिढी (१९७० च्या दशकात जन्मलेली)स्वातंत्र्यानंतर शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी वाढू लागल्या. १९६० ते १९८० या काळातील स्त्रिया दोन विश्वांत जगत होत्या - घर आणि बाहेरचे काम.जागतिक स्तरावर ‘फेमिनिज्म’चा प्रभाव होता, तर भारतात संविधानिक समानता आणि शहरीकरणामुळे स्त्रियांच्या अपेक्षा बदलत होत्या. पी. टी. उषा यांनी क्रीडाक्षेत्रात नवीन मापदंड निर्माण केले. इला भट यांनी असंघटित क्षेत्रातील स्त्रियांना संघटित करून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. स्त्रिया आता थोडा फार स्वतःचा विचार करू लागल्या. ही पिढी परंपरेला नाकारत नव्हती; ती तिच्याशी संवाद साधत होती आणि सामाजिक पातळीवर काही बदल करत होती.६७ वर्षांच्या निवृत्त मुख्याध्यापिका सांगतात, “आम्हाला करिअर हवं होतं, पण चांगली सूनही व्हायचं होतं. मुलं आजारी पडली की अपराधी वाटायचं. घरी राहिलो तर शिक्षण वाया गेल्यासारखं वाटायचं.”......की अपराधी वाटायचं. घरी राहिलो तर शिक्षण वाया गेल्यासारखं वाटायचं.”पण बऱ्याच घरात स्त्रीला मोकळेपणा नि विचार मांडायची संधी अजून मिळाली नव्हती. जरी स्त्री घराबाहेर पडली तरी तिला स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने मिळाले नव्हते. ही पिढी सतत तारेवरची कसरत करत होती. त्यांच्या जिद्दीचा आधारहोता - समतोल.या पिढीतील स्त्रिया अनेकदा दोन जगांमध्ये जगत होत्या-एकीकडे पारंपरिक अपेक्षा आणि दुसरीकडे वाढती आत्मजाणीव. शिक्षण, नोकरी आणि नव्या कल्पनांचा परिचय यामुळे त्यांच्या विचारविश्वात बदल घडू लागला. अनेकांना लैंगिकता ही भावनिक भागीदारीचा एक भाग आहे, असे समजू लागले, तरीही सामाजिक नियमांमुळे तिची उघड अभिव्यक्ती मर्यादितच राहिली.“आमच्याकडे त्याबद्दल खुलेपणाने बोलण्यासाठी शब्दच नव्हते; पण लग्नात फक्त कर्तव्य नाही, तर भावनिक जवळीकही आवश्यक आहे हे आम्हाला हळूहळू जाणवू लागले.”महत्त्वाकांक्षेची पिढी/मुलींची पिढी (२००० नंतर जन्मलेली)१९९० नंतरच्या आर्थिक उदारीकरणामुळे भारतीय समाजात मोठा बदल झाला. कॉर्पोरेट क्षेत्र वाढले, जागतिक संधी उपलब्ध झाल्या आणि आर्थिक स्वातंत्र्य अधिक सुलभ झाले. अनेक मुली डॉक्टर, इंजिनीअर, बँकर, वकील, शिक्षक इत्यादी म्हणून आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. आता स्त्रिया मत मांडणी करू लागल्या आणि उत्तम प्रकारे घर आणि नोकरी सांभाळू लागल्या.यश ही आता अपवादात्मक गोष्ट राहिली नव्हती; ती अपेक्षा बनली होती.४५ वर्षांच्या एका कॉर्पोरेट अधिकाऱ्यांचे शब्द, विचार करायला लावतात:“आम्हाला सांगितलं गेलं की, तुम्ही सगळं करू शकता. पण सगळं उत्तम प्रकारे करणं किती थकवणारं असतं, हे कुणी सांगितलं नाही.”या पिढीने मानसिक आरोग्याविषयी बोलायला सुरुवात केली. भावनिक शब्दसंग्रह वाढला - पण तणावही वाढला आणि स्त्रीला ताण कमी करण्यासाठी घरी मदत कमी मिळाली. बऱ्याच गोष्टींमध्ये समानता नव्हती आणि तिची लढाई चालूच होती.“आमच्या पिढीसाठी संमती, आराम आणि समानता या अत्यावश्यक गोष्टी आहेत. नातेसंबंधात दोन्ही व्यक्तींचा आदर असला पाहिजे.”आजची स्त्री : जाणीव आणि ठामपणाआजची तरुण भारतीय स्त्री डिजिटल युगात वाढली आहे. तिला सीमारेषा आखण्याची, संमतीची आणि मानसिक आरोग्याची भाषा अवगत आहे. ती असमानता किंवा अपमान सहन करण्यास तयार नाही. आजच्या तरुण स्त्रिया लैंगिकतेविषयी निवड, मर्यादा आणि परस्पर आदर या संकल्पनांच्या संदर्भात अधिक मोकळेपणाने बोलतात. सोशल मीडिया, जागतिक चर्चा आणि स्त्रीवादी चळवळींमुळे लैंगिक आरोग्य आणि स्वायत्ततेविषयीचे संभाषण अधिक सामान्य झाले.२८ वर्षांची एक वकील म्हणते,“मी परंपरेचा आदर करते, पण तिच्यासाठी स्वतःला लहान करणार नाही. नातं म्हणजे समानता.”आजची स्त्री स्वतःची ओळख विवाहापलीकडे घडवते. करिअर ही पर्याय नसून पाया आहे. भावनिक जुळवणूक नात्यांत महत्त्वाची आहे. पण स्वातंत्र्याबरोबर दबावही येतो-सतत तुलना, असंख्य पर्यायांमुळे होणारा संभ्रम आणि परिपूर्णतेची अपेक्षा.काय बदललं आणि काय तसंच राहिलं?भारतीय स्त्रीची जिद्द कायम आहे, पण तिचं रूप बदललं आहे.“पूर्वीची जिद्द होती सहन करण्याची.नंतरची जिद्द होती समतोल साधण्याची.आजची जिद्द आहे स्वतःसाठी उभं राहण्याची.”भावना दडपल्या जात नव्हत्या-त्या व्यक्त होत नव्हत्या. आज त्या व्यक्त होतात, नाव दिलं जातं आणि गरज पडल्यास उपचारही घेतले जातात.अनेक शहरी घरांत आजी, आई आणि मुलगी - तिन्ही पिढ्या एकत्र राहतात. त्यांचे मतभेद अध:पतनाचे चिन्ह नाहीत; ते संक्रमणाचे संकेत आहेत.भारतीय स्त्रीचा प्रवास हा कमकुवतपणातून ताकदीकडे जाणारा रेषीय प्रवास नाही. ताकद नेहमीच होती. बदल झाला तो परवानगीचा-बोलण्याची, निवड करण्याची, नाकारण्याची, मदत मागण्याची, स्वतःची व्याख्या करण्याची.प्रत्येक पिढीने आपापला अदृश्य भार वाहिला आहे. आजची स्त्री निवडीचा भार वाहते आणि निवड ही स्वातंत्र्यही आहे, जबाबदारीही.भूतकाळ जगण्यासाठी होता. नंतरचा काळ यशासाठी होता. कदाचित आजचा काळ एकत्रीकरणासाठी आहे - महत्त्वाकांक्षा आणि मानसिक स्वास्थ्य, स्वातंत्र्य आणि नातेसंबंध, व्यक्तिमत्त्व आणि समुदाय यांचा समतोल साधण्यासाठी.भारतीय स्त्री आता केवळ काय सहन करते किंवा काय साध्य करते याने ओळखली जात नाही-ती किती सजगपणे जगते याने ओळखली जाते आणि कदाचित हाच तिच्या भावनिक उत्क्रांतीचा सर्वात क्रांतिकारक टप्पा आहे.(प्राध्यापक व विभाग प्रमुख, मनोविकृती शास्त्र विभाग, बी वाय एल नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल)
Women Day 2026 : सामंजस्य हरवतेय!
निरीक्षण; डॉ. गौरी कानिटकरमहात्मा फुले, आगरकर प्रभुतींनी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. मुलगी शिकली की घर शिकते, घराला शिस्त लागते हा विचार त्यामागे होता. पण आता मुली शिकल्यामुळेच लग्नव्यवस्थेत समस्या निर्माण झाल्या, असा सूर अनेकदा पाहायला मिळतो. तो योग्य नाही. मुलींना आणि स्त्रियांना सन्मानाने वागवल्यास यातील काही समस्यांचे निराकरण होऊ शकेल. महिला दिनाच्या निमित्ताने घेतलेला वेध.गेल्या काही वर्षांमध्ये लग्नव्यवस्थेमध्ये मोठे बदल घडून येत आहेत. मुला-मुलींचे लग्नाचे वाढलेले वय, एकमेकांकडून वाढलेल्या अपेक्षा, जबाबदाऱ्या घेण्यात टाळाटाळ अशा अनेक आघाड्यांवर हे बदल पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यातून या संबंधांना अडसर ठरणाऱ्या नवऱ्याची किंवा बायकोची हत्या केल्याची अगदी टोकाची प्रकरणेही घडताना दिसत आहेत. हल्लीच्या पिढीच्या विचारांमध्ये स्पष्टता नसल्याचे हे परिणाम आहेत, असे वाटते.एका बाजूला आपल्याला आधुनिक व्हायचे आहे, म्हणजे लिव्ह इन रिलेशन्स, काँट्रॅक्ट मॅरेज, वन नाईट स्टँड किंवा ओपन मॅरेज या सोयी आपल्याला हव्या आहेत. त्याच वेळी आपल्या मनात प्रामाणिकपणाच्या काही पारंपरिक कल्पनाही आहेत. या दोन्हींची सांगड घालताना नवीन पिढीची दमछाक होते. मग त्यातून टोकाची पावले उचलली जातात. या सगळ्यांमागील कारणे सध्याच्या सामाजिक परिस्थितीमध्ये शोधता येतील. सध्या एकूणच सगळीकडे अस्थिर वातावरण आहे. तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. जागतिक पातळीवरही सगळीकडे अस्थिरता आहे. कोणत्या क्षणी नोकरी जाईल, याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे या पिढीच्या मनात असुरक्षितता आहे. मग त्यातून निर्माण होणारी नाती घट्ट करण्यासाठी लागणारी पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा कुठे तरी हरवलेला दिसतो. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. म्हणजे मला हे नाते निभावून नेता येईल का, अशी शंका सतत मनामध्ये असते. हे मला जमेलच किंवा वेळ येईल तेव्हा सांभाळून घेता येईल, असे आजची मुले किंवा पालकही म्हणताना दिसत नाहीत. या सगळ्यांचा हा एकत्रित परिणाम आहे.मुलींना किंवा एकूणच स्त्रियांना सन्मान हवा आहे. पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत स्त्रियांना ‘तुला काय कळतंय, तू तुझं चूल आणि मूलच बघ’ असेच ऐकायला मिळत आले आहे. आज याचे प्रमाण नक्कीच कमी झाले आहे; परंतु अजूनही लोकांच्या मनातला पुरुषी अहंकार गेलेला नाही. एखाद्या स्त्रीने एकटीने एखादा निर्णय घेतला, तर ‘मला का सांगितले नाही’असे सर्रास विचारले जाते. ती आता स्वत:च्या जीवावर सगळ्या गोष्टी सांभाळू शकते, याचे जणू काही पुरुषांना वाईट वाटते.पण शिक्षणामुळे आजच्या स्त्रीला स्वत:ची मते असतात, ती वर्तमानपत्र वाचते, तिला जगात घडणाऱ्या घटनांची माहिती असते. अशा वेळी तिला तुझी अक्कल चुलीपुरतीच मर्यादित आहे, असे म्हटलेले आवडत नाही. त्यामुळे या काळात स्त्रिया शिकल्या आणि घराबाहेर पडल्या म्हणून या समस्या निर्माण झाल्या, असे म्हणणे चूक आहे. महात्मा फुले, आगरकर या मंडळींनी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. त्यामागे मुलगी शिकली की घर शिकते, घराला शिस्त लागते, हा विचार होता. पण आता तो विचार कोणी करत नाही. मुली शिकल्या म्हणूनच हे घडत आहे, असाच सूर सगळीकडे पाहायला मिळतो. हे योग्य नाही.मुलींना सन्मान हवा आहे म्हणजे स्वत:चे मत आहे, हे मान्य करायला हवे, घरातल्या, बाहेरच्या, ऑफिसमधल्या प्रत्येक निर्णयप्रक्रियेत आपल्याला विचारात घ्यायला हवे, असे तिला वाटते. आज स्त्री घराबाहेर पडून काम करते तेव्हा पुरुषांना मैत्रीण मिळते तसेच तिलाही मित्र मिळू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे. अशा वेळी घरातले नाते पक्के नसेल तर गैरसमज निर्माण होऊ शकतात. आपल्याला समजून घ्यायला हवे, अशी तिची अपेक्षा असते. ‘गेल्या शंभर वर्षांतले मराठी नाटक आणि विवाहाची बदलती मानसिकता’ या माझ्या शोधनिबंधात हेच मांडले आहे. १९७१ मध्ये आलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकातले आप्पासाहेब बेलवलकर म्हणतात, की मी कुठेही मुशाफिरी केली तरी शेवटी मी बंदराकडेच येणार!’यात मला मुशाफिरी करण्याची मुभा आहे आणि तू माझा स्वीकार करणारच आहेस, हे गृहीत धरलेले दिसते. आता ही मुशाफिरी मुलींना करावीशी वाटते. त्याही परदेशी जातात, कंपनीच्या कामासाठी बाहेर चार ठिकाणी हिंडत असतात आणि अशावेळी काही घडले तर तिच्या घरच्यांनी तिचा स्वीकार करायला हवा, असे तिलाही वाटते. सामंजस्य किंवा एकमेकांना समजून घेणे यावर नात्याचा डोलारा उभा असतो. मात्र हेच कुठे तरी हरवले आहे असे मला वाटते.गेल्या काही वर्षांमध्ये विवाहाचे वय बरेच वाढलेले दिसते. त्यामागे अनेक कारणे आहेत. तीस-चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत चांगली नोकरी मिळवण्यासाठी एक पदवी पुरेशी होती. पदवीधारक झाल्यानंतर अनेक सरकारी नोकऱ्या उपलब्ध होत्या. आता एक पदवी मिळाली म्हणून नोकरी मिळत नाही. तरुणांना चांगले पैसे मिळवून देणारी पदव्युत्तर पदवी घ्यावी लागते. त्यामुळे ‘ऑफबिट’करिअर करण्याची मुभा त्यांना नसते, कारण घर सांभाळण्याची आर्थिक जबाबदारी आजही मुलांवरच आहे.दुसरी गोष्ट म्हणजे मिळालेल्या नोकरीवर मुले समाधानी असतात असे नाही. मग प्रमोशन, पगारवाढ, नोकरी बदलणे असे मार्गक्रमण करत वय २८-२९ च्या पुढे निघून जाते. ही झाली सामाजिक कारणे. याबरोबरच लग्नाचे वय वाढण्याची मानसिक कारणेही आहेत. आजचा तरुण ‘मी अजून लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाही, मी सेटल झाल्यावर लग्न करेन’,असा विचार करतो. सेटलमेंट नेहमी आर्थिक बाबींशी निगडित असते. मात्र मानसिकदृष्ट्या आपण सेटल झालो आहोत का, हा विचार फार कमी लोक करतात.दुसरी बाब म्हणजे मुलाने स्वत:चे घर घ्यावे, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. वयाच्या २८ व्या वर्षी हे शक्य होत नाही. बहुतांशी मुलींना स्वतंत्र राहण्याची इच्छा असते. स्वतंत्र राहायचे असेल तर घराचा हप्ता दोघे मिळून भरू, असे मुलाला वाटते. त्यासाठी मुलींची तयारी नसते. मी नोकरी करेन, नाही तर सोडीन अशी तिची भूमिका असते किंवा करिअर सुरू ठेवण्यासाठी मला सगळ्यांचा पाठिंबा मिळायलाच हवा, असे तिचे मत असते. तुझे पैसे आणि माझे पैसे वेगळे, असेच तिचे म्हणणे असते. आजकाल अनेक दांपत्यांचे आर्थिक व्यवहारही वेगळे असतात. पूर्वी ते ‘आपले पैसे’ असत आणि ते कायमच जास्त असत. त्याच वेळी घरातली कामे करण्याबाबत मात्र समानता दिसते.लग्न करेपर्यंत स्वत:ची एक जीवनशैली ठरून गेलेली असते. दिवसभर काम करून घरी आल्यावर आई-वडील सगळे करतात. त्यामुळे घरी काम करण्याची सवय नसते. त्यामुळे कंफर्ट झोन तयार होतो. मग मी कोणाला तरी उत्तर देणे लागतो, कोणाला तरी माझ्या आयुष्यात सामावून घ्यावे लागणार, याची भीती वाटायला लागते. मग लग्नच नकोसे वाटते. अशात वय ३२-३३ च्या पुढे जाऊ लागते. कुठे तरी एकटेपणाची जाणीव होते, मित्र-मैत्रिणींची लग्ने झालेली असतात. ते एकत्र जमल्यानंतर गप्पांचे विषय बदलतात. त्यामुळे एकटेपणा जाणवू लागतो. अशा कारणांमधून लग्नाची अपरिहार्यता निर्माण व्हायला नको.मला सोबत हवी आहे, हे मनातून वाटायला हवे. यात पालकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. आता बहुतांश ठिकाणी न्युक्लियर फॅमिली असते. त्यामुळे घरांमध्ये भांडणांचे प्रमाण वाढले आहे. ही भांडणे मुलांसमोर होतात. मग भांडायचेच असेल तर लग्न कशाला करायचे, अशी मुलांची मानसिकता तयार होते. वस्तुत: आई-वडिलांकडून लग्नामुळे मानसिक आणि सामाजिक संरक्षण मिळते, असा चांगला मेसेज मुलांपर्यंत पोहोचायला हवा.या वयात लग्न झाल्यावर मुलांच्या अपेक्षा रिजिड होतात. इतर वेळी आधुनिकता आवडत असताना मला माझ्यापेक्षा वयाने मोठा, उंच, जास्त शिकलेला, जास्त पगार असलेला मुलगा हवा, या पारंपरिक अपेक्षा ठेवल्या जातात. यात आपल्याला नेमके काय हवे, हे आपण स्वत:च ठरवायला हवे. लांबून दिसणाऱ्या गोष्टी आकर्षक दिसू शकतात, पण लग्न झाल्यावर त्या गोष्टींसाठी द्यावा लागणारा वेळ हीदेखील अडचण होऊन बसते. त्यामुळे वरवरच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्याला या व्यक्तीबरोबर मोठा काळ व्यतीत करायचा आहे, हे ठरवले आणि मनाची तशी तयारी असेल तर ही प्रक्रिया आनंददायी होऊ शकते. माणूस उलगडणे हा एक सुंदर प्रवास आहे. तो सर्वांनीच अनुभवायला हवा. महिला दिनाच्या निमित्ताने एक सांगावेसे वाटते, महिलांकडे खूप क्षमता आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली त्या क्षमता विसरायला नकोत-. त्यात तरबेज राहायला हवे. त्या वापरल्या नाहीत तर नष्ट होतील, हे वैज्ञानिक सत्य आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. हे त्यांनी लक्षातठेवायला हवे.
Khed News : सरकारी कचेरीचे हेलपाटे वाचले! कनेरसरमध्ये ‘महाराजस्व शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
Khed News : कनेरसर येथे 'छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबीर' उत्साहात; आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते झाले उद्घाटन
कैवल्याचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे...
मनस्विनी : पूर्णिमा शिंदे८ मार्च जागतिक महिला दिन. स्त्री शक्तीचा, उत्साहाचा, उत्सवाचा दिवस. तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस. महिला दिनाच्या निमित्ताने जागतिक स्तरावर अनेक कार्यक्रम घेतले जातात. पण तसं पाहिलं तर महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान होत आहे का? सत्य, समता, स्वातंत्र्य यांचा मिलाप म्हणजे शिक्षण! स्वतःबरोबर कुटुंबाचा समाजाचा देशाचा विकास करणारी ती स्त्री. आज सर्वच क्षेत्र तिने पादाक्रांत केली. तरीही ती कुठेतरी डिवचली जाते. स्त्री सामर्थ्य, धैर्य, औदार्य, धाडसाने क्रांती करणारी ती. तिच्यातील ‘ती’चा शोध घेणारी. नव्या व्यक्तिमत्त्वाला, निर्मितीला, अस्तित्वाला उत्पत्ती देणारी, जन्म देणारी तीच. आकाशाच्या बेड्या तोडून स्वच्छंद विहार करणारी. स्व संरक्षणाची ढाल बनून सामर्थ्याने पुढे चालणारी. इतिहासातील सुवर्ण हस्ताक्षरांनी पानोपानी उमटलेली तिची स्पंदने! आजही प्रेरणादायी आणि आदर्शवादी आहेत.अन्यायाचा प्रतिकार करणारी ती दुर्गा! कधी भवानी. कधी सरस्वती. घराघरांत गृहलक्ष्मी, अन्नपूर्णा, जगत जननी विश्वव्यापीनी, तर कधीच चंडमंड विनाशिनी आहेच! समाजाकडून कधी मकरात, पालखीत बसवून सन्मानित केलेल्या या देवीची क्षणार्धात दासीही केली जाते. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये विषमतेचा बुरुज ढासळून समतेचे बीज पेरले, तरच तिचा बचाव होऊ शकतो. छत्रपतींना घडविणारी जिजाऊ माँसाहेब, साने गुरुजींना घडविणारी श्यामची आई, शत्रूला भिडणारी राणी लक्ष्मीबाई, समाज हितवादी पुण्यश्लोक अहिल्यादेवी, समाजाला घडविणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई, महाराणी ताराबाई, पंडिता रमाबाई, अनुताई वाघ, ताराबाई मोडक, लतादीदी, पी. टी. उषा, सानिया मिर्झा, साईना नेहवाल, कल्पना चावला, मेरी कोम, सुनीता विल्यम्स, इंदिराजी, प्रतिभाताई पाटील, सिंधुताई सपकाळ, मेधा पाटकर, सुचिता कृपलानी, सरोजिनी नायडू, हेलन केलर, मदर टेरेसा, एनी बेझंट, कॅप्टन लक्ष्मी, भगिनी निवेदिता, डॉक्टर आनंदीबाई जोशी यांसारख्या विरांगणानी सर्वच क्षेत्रांत कर्तृत्वाचे झेंडे क्षितिजा पार फडकवलेले आहेतच. देशाच्या विकासात हातभार लावला त्याही स्त्रियाच होत्या आणि त्यांच्या आदर्शाने चालणाऱ्या आज जिजाऊच्या लेकीदेखील. आपल्या सचोटी, हातोटी, कसोटी आणि चिकाटी यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. चालीरीतीच्या शृंखला तोडल्या. चार भिंतींची चौकट मोडली आणि तिच्या पंखात बळ घेऊन तिने उंचच उंच भरारी मारली आहे. तिचा झोका किती उंच गेला तरी आकाशाला भेदून पुन्हा जेव्हा ती पृथ्वीवर येते तेव्हा तेव्हा तिला आव्हाने पेलावी लागतात. असंख्य वेदनांना, अपमान, अवहेलना, उपेक्षा यांना सामोरे जावे लागते. झुंजावे लागते.आयुष्यभर जीवन जगत असताना तिला चूलमूल या चाकोरी बाहेर जाऊन सर्वांप्रती समर्पित व्हावं लागतं. सर्वच क्षेत्रात व कर्तृत्वाने स्व सामर्थ्याने सिद्ध झालेली आजची स्त्री बंड पुकारते. बदलत्या युगाबरोबर बदलते आणि म्हणूनच तिचे हक्काचे सन्मानाचे स्थान तिला द्यावे. हा सन्मान समाजाकडून देण्यात यावा. तिचे खच्चीकरण न करता तिला पाठबळ द्या. संरक्षण, न्याय, हक्क, अधिकार, शिक्षण या पाच गोष्टींमधून तिला जगण्याचे बळ, निर्णयाचे स्वातंत्र्य मिळावे. तिची वैचारिक प्रगल्भता, परिपक्वता समाज निर्मितीमध्ये अनमोल आहे.समाजाच्या विकासासाठी, उन्नतीसाठी तिचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे. स्त्रिया निश्चितच समाजासह इतरांना घडवतात. कधी सक्षम बनून वात्सल्यपूर्ण हिरकणी. तेजस्वी तेजस्विनी, यशाची पताका फडकविणारी यशस्विनी, अन्यायाविरुद्ध कडाडणारी सौदामिनी. संग्रामात रणरागिनी, कर्तव्याचे माप भरणारी झुंजार कर्तृत्वशालिनी आहेच. त्यासह आज प्रत्येक क्षेत्रांत कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, कृषी, न्याय, समाज, राजकारण, उद्योजिका, पर्यावरण, कॉर्पोरेट या सर्व क्षेत्रांत तिने तिचे नाव सुवर्णक्षणांनी कोरले आहे. ३६५ दिवसांपैकी केवळ एक दिवस तिचा म्हणून साजरा करण्यात अर्थ नाही. फक्त एक करा, समाजाकडून नराधमांकडून तिच्यावर होणारे अन्याय, अत्याचार, बलात्कार, अवमूल्यन, फसवणूक याचा प्रतिकार वेळीच बिमोड व्हायला हवा.स्त्रीला ितचा स्वाभिमान आहे कारण ती माणूसच आहे. या विश्वाची निर्मिती तिच्यातूनच झालेली आहे. परोपकार, शौर्य, त्याग, मातृत्व, प्रीती या सर्व भूमिकांतून आदर्श ठरलेली स्त्रीशक्ती खरोखरच उल्लेखनीय आहे तिच्याशिवाय घर, समाज आणि देश अपूर्ण आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रियांना भक्कम आधार द्या. त्यांस सहकार्य द्या, हीच महिला दिनी उत्तम भेट ठरू शकते.
Shirur News : पराभवानंतरही भाजपची आक्रमक खेळी! पाबळच्या पाणीप्रश्नासाठी विखे-पाटलांकडे साकडे
Shirur News : पराभवानंतरही भाजप पाबळमध्ये सक्रिय; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर रखडलेल्या पाणीप्रश्नासाठी नेत्यांचा मंत्रालयात पाठपुरावा.
Indapur News : 'उमेद' महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सणसरमध्ये रणमर्दिनी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या मका भरडा प्रक्रिया युनिटचे उत्साहात भूमिपूजन.
स्वत:ची ओळख, स्वत:ची ताकद - आजची स्त्री, उद्याचा भारत!
गोष्ट लहान, अर्थ महान : शिल्पा अष्टमकरआजची स्त्री म्हणजे केवळ घराची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नसून, ती शिक्षण, करिअर, समाज आणि राष्ट्र घडवणारी एक सक्षम शक्ती आहे. महिला दिन हा फक्त एक दिवस साजरा करण्यासाठी नाही, तर स्त्रियांच्या हक्कांची, क्षमतांची आणि आत्मविश्वासाची जाणीव करून देणारा महत्त्वाचा दिवस आहे.आजच्या मुलींनी सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. “मी करू शकते” ही भावना मनात रुजवली, तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. शिक्षण हे स्त्रीचे सर्वात मोठे शस्त्र आहे. त्यामुळे संधी मिळेल तेवढे शिकणे, नवीन कौशल्ये आत्मसात करणे आणि स्वतःला अपडेट ठेवणे आवश्यक आहे.स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. ताण-तणाव असताना मोकळेपणाने बोलणे, मदत मागणे ही कमजोरी नसून शहाणपणाचे लक्षण आहे.आजच्या काळात स्वसंरक्षणाचे ज्ञान आणि कायदेशीर हक्कांची माहिती असणे फार महत्त्वाचे आहे. आपल्या हक्कांसाठी उभे राहणे, चुकीला ‘नाही’ म्हणणे आणि स्वतःचा सन्मान जपणे हे प्रत्येक स्त्रीने शिकले पाहिजे. स्त्री ही मुळातच बहुगुणी असते - ती संवेदनशील आहे, कणखर आहे, आणि परिस्थितीशी जुळवून घेणारी आहे. एक सक्षम स्त्री फक्त स्वतःचेच नाही, तर संपूर्ण समाजाचे भविष्य उज्ज्वल करते.या महिला दिनी प्रत्येक मुलीने आणि स्त्रीने एवढे नक्की ठरवावे -“मी माझी स्वप्ने घाबरून सोडणार नाही, मी स्वतःसाठी उभी राहीन आणि माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवीन.”समाजात अनेकदा “महिला अधिक सामर्थ्यवान की पुरुष?” असा प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न फक्त शारीरिक ताकदीपुरता मर्यादित न ठेवता, मानसिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक सामर्थ्याच्या दृष्टीने पाहणे अधिक योग्य ठरते. कारण सामर्थ्य हे एकांगी नसून बहुआयामी असते.शारीरिक सामर्थ्य सामान्यतः पुरुषांचे शरीर अधिक स्नायूयुक्त असल्याने शारीरिक ताकद जास्त असते, असे मानले जाते. जड कामे, युद्ध, कष्टाची शारीरिक मेहनत यामध्ये पुरुष आघाडीवर दिसतात. मात्र आजच्या काळात अनेक महिला खेळ, सैन्य, पोलीस दल, साहसी क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. त्यामुळे शारीरिक सामर्थ्य हा एकमेव निकष ठरू शकत नाही.मानसिक व भावनिक सामर्थ्यमानसिक व भावनिक सामर्थ्याच्या बाबतीत महिला खूप पुढे आहेत. वेदना सहन करण्याची क्षमता, कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळणे, ताण-तणावातही संयम राखणे हे महिलांचे मोठे सामर्थ्य आहे. आई म्हणून प्रसूतीसारखा अत्यंत कठीण अनुभव सहन करणे हे महिलांच्या अद्वितीय शक्तीचे उदाहरण आहे. पुरुषही मानसिकदृष्ट्या खंबीर असतात, पण भावना व्यक्त करण्यात ते अनेकदा मागे राहतात.बौद्धिक सामर्थ्य बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता, सर्जनशीलता या बाबतीत महिला व पुरुष समान आहेत. शिक्षण, विज्ञान, राजकारण, उद्योग, कला अशा सर्व क्षेत्रांत महिलांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. आज महिला डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी म्हणून देशाचे नेतृत्व करत आहेत. यावरून बौद्धिक सामर्थ्यात कोणताही लिंगभेद नाही हे स्पष्ट होते.सामाजिक सामर्थ्य पूर्वी महिलांना दुय्यम स्थान दिले जात होते; मात्र आज समाजात महिलांचे स्थान झपाट्याने बदलत आहे. स्वावलंबन, आत्मविश्वास, हक्कांची जाणीव आणि नेतृत्वगुण यामुळे महिला अधिक सक्षम होत आहेत. पुरुषांचेही सामाजिक सामर्थ्य मोठे आहे, परंतु स्त्री-पुरुष परस्परपूरक असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.“महिला की पुरुष कोण सामर्थ्यवान?” या प्रश्नाचे उत्तर कोण अधिक, कोण कमी असे नसून दोघेही वेगवेगळ्या प्रकारे सामर्थ्यवान आहेत, असे आहे. पुरुषांचे सामर्थ्य जिथे शारीरिक व बाह्य स्वरूपाचे असते, तिथे महिलांचे सामर्थ्य मानसिक, भावनिक व सहनशीलतेत दिसते. समाजाचा समतोल राखण्यासाठी दोघांचेही सामर्थ्य तितकेच आवश्यक आहे. स्त्री आणि पुरुष हे प्रतिस्पर्धी नसून सहकारी आहेत. समतेच्या आणि परस्पर सन्मानाच्या नात्यातच खरे सामर्थ्य दडलेले आहे.सामर्थ्यवान कोण?नदीच्या काठी एक ओंडका होता. त्याच्या आजूबाजूला खडक (पाषाण) होते. ओंडक्याच्या जवळच्या खडकातून एक नवीन रोपटे उगवले.नदीच्या पाण्यामुळे ते भराभर वाढू लागले. त्याला हिरवी पाने आली. ती एक नाजूक वेल होती. वेल हळूहळू बोलायला शिकली नि मग ओंडक्याच्या अन् तिच्या गप्पा रंगू लागल्या. वेलीला जगाबद्दल अनुभव सांगताना ओंडका म्हणाला, “इथे पुरुषांचे वर्चस्व आहे, येथील पुरुष पराक्रमी आहेत. तर स्त्री मात्र अतिशय दुबळी आहे, तिला जगण्यासाठी पुरुषांचा आधार घ्यावा लागतो. आता तूच पाहा ना, तुला वाढायचे असेल तर माझा आधार घ्यावा लागेल.” पण वेलही अतिशय हुशार नि चौकस होती. ती म्हणाली, “जगण्यासाठी सर्वांना एकमेकांच्या आधाराची गरज असते. जसे पाण्यासाठी सर्वांना नदीचा आधार घ्यावा लागतो, पिलांना आपल्या माता-पित्यांचा आधार घ्यावा लागतो, तसाच मी पण वाढीसाठी तुझा आधार घेतला आहे, तूही जमिनीवर उभा आहेस म्हणजेच एका स्त्रीचा आधार घेतला आहेस.” मात्र कितीही समजावले तरी स्त्री ही दुबळी, पुरुष सामर्थ्यवान या मताशी ओंडका ठाम होता.वेल मात्र भराभर वाढत होती. आता ओंडक्याच्या अंगावर जागा उरली नाही असे पाहून ती खडकाच्या अंगावर त्याचा आधार घेण्यासाठी चढली. ओंडका तिच्याकडे पाहून कुत्सितपणे हसायचा. मात्र त्या हसण्याकडे वेल दुर्लक्ष करायची. या ओंडक्याचे स्त्री-पुरुष भेदभावाचे विचार पुसून टाकण्याचा विचार वेलीने केला. एके दिवशी निसर्गाने वेलीला ही संधी दिली. अतिवृष्टीमुळे नदीला पूर आला. अनेक प्राणी, दगड पाण्याबरोबर वाहू लागले. ओंडक्याकडेही पाण्याने मोर्चा वळविला. खरे तर पाण्याने ओंडका वाहून जायचा पण वेलीने त्याला घट्ट बांधून ठेवले असल्याने तो तसाच उभा राहिला. एका वेलीने, एका स्त्रीने त्याचे प्राण वाचविले. पुढे नदीचे पाणी ओसरल्यावर ओंडक्याने वेलीची क्षमा मागितली.तात्पर्य : यशस्वी होण्यासाठी जीवनात स्त्री-पुरुषांनी एकमेकांचा आधार घ्यावा लागतो.विचार : जेव्हा अहंकार नष्ट होतो, तेव्हा आत्मा जागृत होतो.
प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफआज ‘जागतिक महिला दिन’ आहे. हा दिवस जगभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो. अलीकडे हा दिवस साजरा करायच्या नावाखाली काही कुटुंबात घरातील पुरुष माणसे स्वयंपाक करतात आणि बाईला आराम देतात. काही असो; परंतु वर्षभरात येणारे असे ‘दिन’ त्या दिवशी तरी कमीत कमी साजरे होतात. काही संघटना एकत्रित येऊन आपले विचार मांडतात. एखाद-दुसरी समस्या सरकार दफ्तरी पोहोचते. त्यावर विचार होतात. काहीतरी चांगले घडत राहते, हे निश्चित! पण माझ्या आयुष्यात असे ‘महिला दिन’ मी अधेमध्येही अनुभवलेले आहेत. आज या दिनाच्या निमित्ताने त्याची परत आठवण आली इतकेच! या लेखात मी फक्त रेल्वे प्रवासाची दोनउदाहरणे देते. - मोबाईलमध्ये रेल्वेचे ॲप डाऊनलोड करून पहिले तिकीट काढले होते पनवेल ते चिपळूणचे! शनिवारी संध्याकाळी साधारण आठची ट्रेन होती आणि मी रात्री साडेअकरापर्यंत चिपळूणला उतरणार होते. तिथे आयोजक मला घ्यायलाही येणार होते आणि हॉटेलपर्यंत पोहोचवणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ चा मला कार्यक्रम होता. ही संपूर्ण ट्रेन फक्त रिझर्वेशनची होती याची मला कल्पना नव्हती. शिवाय मी जे तिकीट काढले होते त्याचा वेटिंग लिस्ट नंबर पाच होता, जे तिकीट मी एक महिना आधी काढले होते त्यामुळे महिनाभरात ते कन्फर्म झालेच असेल असे मला वाटले. ते कन्फर्म झाले की नाही ते कसे पाहायचे, याचे ज्ञान माझ्याकडे तेव्हा नव्हते. फलाटावर माझ्या बाजूला बसलेला एक माणूस माझ्याशी बोलत होता. तो त्याच्या आईला आणि मावशीला घेऊन कोकणात चाललेला होता. त्याच्याशी बोलता बोलता मी माझ्या तिकिटाविषयी बोलले की, मला कळत नाही मी कोणत्या सीटवर जाऊन बसायचं ते. मला मेसेजमध्ये काही आलेलेच नाही. तेव्हा ते म्हणाले की, तुमचे तिकीट मला दाखवा ते कन्फर्म झाले आहे की नाही मी सांगतो. त्याने ते तिकीट हातात घेऊन ते कन्फर्म झाले नसल्याचे सांगितले. शिवाय कन्फर्म न झालेल्या तिकिटाचे पैसे आपल्याला परत येतात त्यामुळे तुम्ही जर ट्रेनमध्ये चढलात, तर तुम्ही विदाऊट तिकीट चढलात, असा त्याचा अर्थ होतो, हे ऐकून मी खूप घाबरले. त्यानंतर कोणत्या ट्रेन होत्या किंवा कसं पोहोचायचं याबद्दल मी खूप साशंक झाले. तेव्हा ते म्हणाले की, माझ्या मावशीचे तिकीट आठ डबे दूर आहे. मावशी आणि आई दोघींनाही मोबाईल वगैरे वापरता येत नाही त्यामुळे दोघींनाही एकत्र घेऊनच मला प्रवास करावा लागेल. तुम्ही माझ्या तिकिटाचा फोटो काढून घ्या आणि या डब्यात, या सीटवर जाऊन बसा आणि टीसी आल्यावर त्याला नियमात असेल त्याप्रमाणे पैसे द्या! मी ‘हो’ म्हटले; परंतु चारच दिवसांनी गणपती येणार होते त्यामुळे ती ट्रेन इतकी खचून भरली की तीन तास मी माझ्या सीटवरून उठू शकले नाही की कोणताही टीसी कोणत्याच सीटपर्यंत पोहोचू शकला नाही.अशा तऱ्हेने मला माहीत नाही; परंतु कोणीतरी असेच भेटत राहतात. मदत करत राहतात. सोलापूर रेल्वे स्टेशनपासून खासगी वाहनाने तासाभराच्या अंतरावर एक गाव होते. जिथे मला एक पुरस्कार घेण्यासाठी जायचे होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे मुंबईहून शनिवारी रात्रीचे तिकीट काढले. रविवारच्या सकाळी सोलापूरला उतरून तयार होऊन नऊ ते पाच संपन्न होत असलेल्या कार्यक्रमाला पोहोचले. काही कार्यक्रमात उद्घाटनाच्या सत्रात पारितोषिके दिली जातात, तर काही कार्यक्रमात आभाराच्या सत्रात. हे सर्व विचारात घेऊन सोलापूरवरून एक ट्रेन संध्याकाळी ६.३० ला निघणारी होती, तर दुसरी ट्रेन रात्री १०.३० ची होती. मी विचार केला जर आभाराच्या सत्रात पारितोषिक वितरण झाले तर आपण ६.३० पर्यंतही ट्रेन पकडायला पोहोचू शकणार नाही. त्यामुळे आपण १०.३० च्या ट्रेनचे टिकीट काढू या, जेणेकरून सोमवारी पहाटे मुंबईत उतरून घरी जाऊन सकाळी ८.३० पर्यंत कॉलेजमध्ये पोहोचता येईल! तो कार्यक्रम व्यवस्थित ५.३० ला संपला. आयोजकांनी विचारले, “तुमच्या हातात दोन पर्याय आहेत एक आत्ताच तुम्ही निघालात तर ६.३० पर्यंत सोलापूर रेल्वे स्टेशनला पोहोचाल कारण माझ्या ड्रायव्हरची ड्युटी सातला संपणार आहे. नाही तर आमच्या घरी येऊन जेवून साधारण ९ च्या सुमारास निघालात तरी तुम्हाला १०.३०ची ट्रेन आरामात मिळेल; परंतु टॅक्सीने तुम्हाला प्रवास करावा लागेल. मला स्वतःला तुमच्याबरोबर येता येणार नाही कारण मला आज भावाला अॅडमिट केले तिकडे रात्री त्याच्यासोबत थांबायचे आहे. मी सुज्ञ विचार केला की गाडी आहेच तर स्टेशनकडे निघून जावे. त्यांनी दिलेल्या गाडीतून मी सुखरूप स्टेशनवर पोहोचले. तिथे एकमेव वेटिंग रूम होती. तिथे गेले आणि बसले समोर एक जोडपे बसलेले होते. मी सहजच त्यांना विचारले, “तुमची ट्रेन कितीची आहे?” तेव्हा ते म्हणाले, “आमची ट्रेन ६.३० ची होती पण ती लेट झाली आहे. ” मी पाहिले तर स्टेशनवर पण तुरळकच माणसे दिसली होती. मी चष्मा लावला आणि मोबाईल बाहेर काढला आणि मला धक्काच बसला कारण माझी गाडी रात्री १०.३० च्या ऐवजी मध्यरात्री २.३० वाजता येत असल्याचा संदेश दिसला. एकंदरीत तिथे थांबणे प्रशस्त वाटत नव्हते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये बोर्डांच्या प्रॅक्टिकल एक्झाम सुरू होणार होत्या त्यामुळे कसेही करून मला कॉलेजमध्ये सकाळी साडेआठला पोहोचणे आवश्यक होते. माझ्या चेहऱ्यावरचा तणाव कदाचित समोरचे जोडपे निरखत असावे. त्या माणसाने विचारले, “काय झाले ताई?” मी म्हटले, “माझी ट्रेन लेट आहे. इथे काही बरी व्यवस्था दिसत नाही की मी थांबू शकेल उशिरापर्यंत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या मला कोणत्याही परिस्थितीत कॉलेजमध्ये पोहोचणं भाग आहे.” तो माणूस म्हणाला, “ताई आमच्याबरोबर चला की आमच्या गाडीतून!” मी म्हटले, “कसं शक्य आहे ते? माझं तिकीट तर पुढच्या गाडीचं आहे. तर तो माणूस म्हणाला, “आमची मुलगी पाच वर्षाची आहे परंतु ती आईशिवाय झोपत नाही आणि गाडीमध्ये तर तिला आम्ही एकटीला झोपवूच शकत नाही तर तुम्ही तिच्या सीटवर झोपू शकता. तशीही आमची एक सीट रिकामीच राहणार आहे.” “ पण माझं टिकीट...? मी पुटपुटले. “बघा दहा मिनिटं आहेत अजून... तुम्ही पटकन जाऊन एक साधं सोलापूर मुंबई तिकीट काढून आणा कारण आता तुम्हाला कोणतेही रिझर्वेशन मिळणार नाही!” बाकी आपण टीसीशी काय ते बोलूया....”मी जेमतेम टिकीट काढून परतले. आम्ही त्यांनी रिझर्वेशन केलेल्या डब्यासमोर जाऊन उभे राहिलो ट्रेनमध्ये चढलो. त्या ट्रेनमध्ये टीसीला माझी परिस्थिती त्यांनी समजावून सांगितली. त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थित कॉलेजमध्ये पोहोचले. मला खूप लोकांनी मदत केली आहे, त्यांना परतफेड करू शकत नाही परंतु ती आठवण ठेवून मी दुसऱ्या कोणालातरी वेगळ्या प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न नक्कीच करते!?pratibha.saraph@ gmail.com
Maharajswa Abhiyan : राजगड तालुक्यातील करंजावणे येथील शिबिरात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयाने शेकडो कुटुंबांना मिळाला दिलासा.
Alandi News : इंद्रायणी घाटावर वृद्ध महिलेमार्फत राजरोस गावठी दारूची विक्री; सात मावळे संघटनेने स्टिंग ऑपरेशन करत प्रशासनाचा बुरखा फाडला.
कथा : प्रा. देवबा पाटीलसीता व नीता त्यांच्या संध्याकाळचा शाळेचा अभ्यास पूर्ण करून मावशीजवळ येऊन बसल्यात. त्यांचा आज गृहपाठ जास्त असल्याने त्यांना तो पूर्ण करायला जरा जास्तच वेळ लागला होता. तरी मावशीजवळ त्या आल्याने मावशीला त्यांना काही चारायचे आहे हे समजले. मावशी त्यांना घेऊन गच्चीवर गेली. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.गप्पा करता करता काळोख पडायला सुरुवात झाली. रस्त्यावरील प्रकाशदिवेसुद्धा चमचम करीत चमकू लागलेत. त्यांच्या तेजस्वी प्रखर प्रकाशाने घराची गच्ची न्हाऊन निघाली. त्या पथदिव्यांच्या चमचम प्रकाशामुळे ज्ञानार्जनात गुंग झालेल्या सीता-नीताचे डोळेसुद्धा एकदम दीपलेत. ते बघून “अशा प्रखर प्रकाशात आपले डोळे का दीपतात मावशी?” असा प्रश्न सीताने विचारलाच.“आणि उन्हातून घरात आल्यावर आपल्याला अंधारल्यासारखे का होते?” नीतानेही प्रश्न केला. मावशीने सांगण्यास सुरुवात केली, “आपल्या डोळ्यांत शिरणाऱ्या प्रकाशाचे नियंत्रण करण्याचे काम डोळ्यांतील भिंगापुढे असलेली बाहुली करत असते. नेहमीच्या सामान्य प्रकाशात ह्या बाहुलीचा एक ठरावीक आकार कायम असतो. ज्यावेळी प्रकाश हा अतिशय तीव्र किंवा प्रखर असतो त्यावेळी या बाहुलीचे छिद्र अगदी लहान होते. कमी प्रकाशात वा रात्री हे छिद्र आपोआप मोठे होऊन जास्त प्रकाश आत घेण्यास मदत करते. बाहुलीचा असा आकार बदलण्यास म्हणजे प्रकाशानुसार लहान-मोठे होण्यास काही कालावधी लागतो. आपण अचानक जेव्हा उन्हात किंवा तीव्र प्रकाशात जातो तेव्हा बाहुलीचा आकार योग्य प्रकारे लहान होईपर्यंत जो वेळ लागतो तेवढ्या वेळात बराचसा प्रखर प्रकाश डोळ्यांत शिरतो आणि डोळे दीपतात.” “तसेच उन्हातून घरात आल्यावरसुद्धा आधी उन्हाने मोठा झालेला बाहुलीचा आकार सुयोग्य प्रकारे लहान होण्यास किंचितसा वेळ लागत असल्याने त्या वेळात आधी मोठ्या असलेल्या बाहुलीला कमी प्रकाश मिळतो. त्यामुळे क्षणभर अंधारल्यासारखे होते.” मावशीने सांगितले.“मग रात्रीच्या अंधारात आपणास कसे दिसते?” नीतानेच विचारले.“कोणतीही वस्तू आपणास दिसण्यासाठी त्या वस्तूवरून प्रकाशाचे परावर्तन होऊन तो प्रकाश आपल्या डोळ्यांत शिरणे आवश्यक असते. रात्री अंधार असल्याने प्रकाश अतिशय मंद असतो व कधी कधी तर नसतोच. त्यामुळे आपणास अंधारात वस्तू दिसत नाही. पण आपण जर बराच वेळ अंधारात बसलो तर आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या आपोआप थोड्या मोठ्या होतात. त्यामुळे तेथील प्रकाश मंद असला तरी आपल्या डोळ्यांत त्या प्रकाशाचे बरेचसे किरण शिरतात आणि आपल्याला अंधुकसे दिसायला लागते.” मावशीने उत्तर दिले.अशाच त्या त्याही दिवशी गच्चीवर गप्पा मारत असताना अचानक सीताचे लक्ष मावशीच्या तळहातांकडे गेले. मावशीचे हात मेंदीने चांगलेच रंगलेले, लाल झालेले होते. ते बघून सीता म्हणाली,‘मावशी तुझे हात तर मेंदीने चांगलेच रंगले आहेत गं. पण मावशी मेंदीची पाने हिरवी असूनही त्यामुळे हातापायांना लाल रंग कसा येतो?”मेंदीच्या पानांमध्ये लॉर्सोन नावाचे एक रंगद्रव्य असते. मेंदीमुळे हातापायांना येणारा लाल रंग या रसायनामुळे येतो. मेंदीची कोवळी पाने खुडून ती सुकल्यावर त्यांची वस्त्रगाळ पूड तयार करतात. त्याचा लगदा तयार होईल, अशा प्रमाणात त्यामध्ये पाणी व लिंबाचा रस टाकून ते मिश्रण रात्रभर भिजत ठेवतात. त्यामुळे पानांच्या पेशीतून ही रंगद्रव्ये मोकळी होऊन बाहेर पडतात. ज्यावेळी ती भिजवलेली मेंदी हातापायांना लावतात त्यावेळी आपल्या त्वचेच्या वरच्या थरातील पेशींतील रसायनासोबत तसेच नखं व केसांच्या मृत पेशींतील रसायनासोबतत्या मेंदीतील रंगद्रव्याची प्रकिया होते व त्वचेच्या वरच्या थरातील पेशींना, नखांच्या व केसांच्या मृत पेशींना ते रंगद्रव्य जाऊन चिकटते. त्यामुळे त्यांना लाल रंग प्राप्त होतो.” मावशीने खुलासेवार स्पष्टीकरण दिले. एवढ्यात मावशीला काकांचा फोन आला व त्यांच्या गप्पा बंद झाल्या.
Gas Price Hike : तुमचं किचन बजेट कोलमडणार? घरगुती सिलिंडर ६० रुपयांनी महागला..वाचा नवी दरवाढ
Gas Price Hike : घरगुती सिलेंडर ६० तर व्यावसायिक सिलेंडर ११५ रुपयांनी महागले; गॅस टंचाईच्या भीतीपोटी बुकिंगमध्ये वाढ झाल्याने काळाबाजार होण्याची शक्यता.
Parking Issue : निगडी प्रशासकीय संकुलात पार्किंगचा गोंधळ! कामासाठी येताय? मग ‘हे’नक्की वाचा
Parking Issue : निगडी येथील तहसील, दस्त नोंदणी आणि आधार केंद्रात नागरिकांची मोठी गर्दी; अपुऱ्या पार्किंगमुळे रस्त्यावरच वाहने लावण्याची वेळ, वाहतूक कोंडीत मोठी वाढ.
Pimpri Chinchwad Police : सांगवी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी! हरविलेले १३० मोबाईल मालकांना केले परत
Pimpri Chinchwad Police : वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या नेतृत्वाखालील टीमची उल्लेखनीय कामगिरी; 'CEIR' पोर्टलच्या माध्यमातून विविध राज्यांतून आणि शहरांतून मोबाईल हस्तगत.
दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०८ मार्च २०२६
पंचांगआज मिती फाल्गुन कृष्ण पंचमी शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग ध्रुव. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १७ फाल्गुन शके १९४७-४८. रविवार दिनांक ८ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.५२ मुंबईचा चंद्रोदय ११.०४ पीएम मुंबईचा सूर्यास्त ०६.४६ मुंबईचा चंद्रास्त ०९.३७ एएम राहू काळ ०५.१७ ते ०६.४६ .रंग पंचमी, १४ पर्यन्त चांगलादैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
PCMC News : शहरात कुत्र्यांच्या टोळ्यांचे साम्राज्य वाढल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप करत संदीप वाघेरे प्रशासनाविरुद्ध मैदानात.
Pimpri Chinchwad News : प्रभाग १६ मध्ये डासांचा सुळसुळाट; पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतापले
Pimpri Chinchwad News : आरोग्य विभागाला नगरसेविका रेश्मा कातळे यांचे लेखी निवेदन; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी.
Nitin Mittal: नितीन मित्तल हे K-nest या अॅल्युमिनियम फॉर्मवर्क आणि बांधकाम तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. २०१४ साली ५,००० चौरस फुटांच्या छोट्या कार्यशाळेतून सुरू झालेल्या या कंपनीने आज १० लाख चौरस फुटांचा विस्तार केला असून ती बहुराष्ट्रीय उद्योगात रूपांतरित झाली आहे.
West Bengal: ९व्या आंतरराष्ट्रीय संताल परिषदेसाठी राष्ट्रपती मुर्मू शनिवारी बंगाल दौऱ्यावर आल्या. मात्र त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा राज्य सरकारचे कोणतेही मंत्री उपस्थित नव्हते.
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
महामार्गाच्या भूसंपादनातील मोजणी प्रक्रियेबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
Stock Market: आठवड्याच्या पातळीवर सरलेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 2,368 अंकांनी म्हणजे 2.91 टक्क्यांनी कोसळून 78,918 अंकावर बंद झाला. या आठवड्यात विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 728 अंकांनी म्हणजे 2.89 टक्क्यांनी कोसळून 24,450 अंकावर बंद झाला.
Oil Crisis: भारताची तेलाची चिंता मिटली; लवकरच रशियाचे बॅरल पोहोचणार
Oil Crisis: रशियाच्या जहाजावर जे तेल सध्या समुद्रात उपलब्ध आहे. ते तेल भारताने खरेदी करण्यास हरकत नाही असे अमेरिकेने म्हटले आहे.
Rohit Pawar : “तुम्ही स्वार्थी की अजितदादा प्रेमी?”; रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांना घेरले
Rohit Pawar : २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर संशय व्यक्त केला आहे.
Finance Ministry Report: युद्ध लांबल्यास भारतात महागाई वाढेल!
Finance Ministry Report: 1991 मध्ये ज्याप्रमाणे खनिज तेलाच्या किमती मध्यपूर्वेतील घडामोडीमुळे वाढल्या होत्या. तसा प्रकार युद्ध रेंगाळल्यास होऊ शकतो. अशा परिस्थितीत जागतिक ऊर्जा व्यवस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो असे स्पष्ट करण्यात आले.
Thalapathy Vijay: “मला घरात येऊ दिले जात नाही”; अभिनेते थलपती विजयच्या पत्नीची नवी याचिका
Thalapathy Vijay: हा वाद एप्रिल २०२१ मध्ये सुरू झाला, जेव्हा विजय यांचे एका अभिनेत्रीशी विवाहबाह्य संबंध असल्याचे संगीता यांना समजले. अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र विजय यांनी दाद दिली नाही.
उद्धव ठाकरेंचा दणका! तीन नगरसेवकांना अंतिम नोटीस; आता थेट कारवाई होणार?
Uddhav Thackeray :
Suryakumar Yadav PC : या मोठ्या लढतीसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज असून खेळाडूंमध्ये कमालीचा उत्साह असल्याचे त्याने नमूद केले.
मोठा फेरबदल..! ३७ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कोणाला कुठे मिळाली नवी जबाबदारी?
IPS Transfers 2026 :
महाराष्ट्र तापणार! पुढील काही दिवस धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा
IMD Weather Forecast : भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि दक्षिण भारतात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
NSE पाठोपाठ BSE आता BKC मध्ये येणार
मुंबई :वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) मध्ये व्यावसायिक जागेची मागणी प्रचंड वाढत असताना, बीएसईने मुंबईत विस्तार करण्यासाठी बीकेसी येथे भूखंडाबाबत एमएमआरडीएकडे विचारणा केली आहे.बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुंदररामन राममूर्ती यांनी मुख्य नियामक अधिकारी कमला कंथाराज यांच्यासह डॉ. संजय मुखर्जी,भा. प्र. से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली.नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाने बीकेसी परिसरात नुकत्याच केलेल्या विस्तारापाठोपाठ ही घडामोड झाली आहे. बीकेसीचे भारतातील अग्रगण्य वित्तीय व व्यापारी केंद्र म्हणून स्थान अधिक बळकट झाले आहे.गेल्या काही वर्षांत,आघाडीच्या वित्तीय संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि जागतिक गुंतवणूक संस्थांनी बीकेसीला प्राधान्य दिले आहे, जे बीकेसीचे मोक्याचे ठिकाण, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि भारताच्या आघाडीचे आर्थिक परिसंस्थेचे केंद्र म्हणून शिक्कामोर्तब करते.अशा धोरणात्मक गुंतवणुकीच्या माध्यमातून मुंबईत जागतिक दर्जाच्या वाणिज्य पायाभूत सुविधांच्या विकसित करण्यावर एमएमआरडीएचा विशेष भर आहे. बीएसईच्या मागणीच्या अनुसरून योग्य भूखंड शोधून त्याच्या वाटपाची प्रक्रियेला अंतिम रूप देण्यासाठी एमएमआरडीए बीएसई सोबत काम करण्यास उत्सुक आहे.
महाराष्ट्राचा हरित निर्देशांक सुधारला
मुंबई : औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखतानाच महाराष्ट्र राज्याने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातही देशात आपला दबदबा निर्माण केला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, वृक्ष आच्छादनामध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून, किनारपट्टीच्या संरक्षणासाठी महत्त्वाच्या असलेल्या कांदळवन क्षेत्रातही राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. भारताच्या एकूण कांदळवन क्षेत्रापैकी ६.३ टक्के क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे.आर्थिक सर्वेक्षण (२०२५-२६) अहवालानुसार, राज्यात राबवण्यात आलेल्या विविध वनीकरण मोहिमा आणि शहरी वृक्षारोपण प्रकल्पांमुळे महाराष्ट्राचा हरित निर्देशांक सुधारला आहे. केवळ घोषित वनक्षेत्रातच नव्हे, तर वनक्षेत्राबाहेरील वृक्षांच्या वाढीमध्येही राज्याने आघाडी घेतल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. शहरांमधील वाढते काँक्रीटीकरण आणि विकासाचे प्रकल्प सुरू असतानाच, दुसरीकडे वृक्षारोपणाचे संतुलन साधण्यात प्रशासनाला यश आल्याचे हे निदर्शक आहे.राज्याच्या ७२० किमी लांबीच्या किनारपट्टीचे चक्रीवादळे आणि अन्य नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करणाऱ्या कांदळवनांच्या संवर्धनात महाराष्ट्र आता देशात अग्रेसर ठरला आहे. देशातील एकूण कांदळवन क्षेत्रापैकी ६.३ टक्के क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. 'भारतीय वन कायदा, १९२७' च्या कलम २० नुसार, राज्यातील सुमारे ११ हजार ५४८ हेक्टर कांदळवन क्षेत्राला 'राखीव वन' म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्राला कायदेशीर संरक्षण मिळाले आहे.राज्यातील किनारपट्टीवरील पाच जिल्ह्यांमध्ये (पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग) १९९ गावांमध्ये 'कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्मिती योजना' २०१७ पासून प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग आहे. २०२४-२५ मध्ये या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी २.७३ कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. तर चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) डिसेंबरपर्यंतच लाभार्थ्यांनी २.९८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. कांदळवन क्षेत्राचा विस्तार करतानाच खेकडा पालन, पिंजऱ्यातील मत्स्यशेती, कालवे व शिंपले पालन आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.आकडेवारी काय सांगते?एकूण कांदळवन क्षेत्र - ३१५.०९ चौ. किमीनूतन लागवड (२०२५-२६) - ४०५.४६ हेक्टर (डिसेंबरपर्यंत)
पश्चिम आशियातील युद्धाचा साखर उद्योगाला फटका
नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता देशातील साखर उद्योगापर्यंत पोहोचला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि सागरी वाहतुकीतील अडथळ्यांमुळे भारताची साखर निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. याचा मोठा परिणाम देशांतर्गत बाजारावर होणार असून, १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा शिल्लक राहण्याची भीती निर्माण झाली आहे.युद्धाच्या ज्वाळांमुळे आंतरराष्ट्रीय निर्यातीचे मार्ग असुरक्षित झाले आहेत. वाहतूक विस्कळित झाल्याने साखरेची निर्यात मंदावली आहे. मागील वर्षी सरकारने १० लाख टन निर्यातीचा कोटा दिला होता, त्यापैकी केवळ ८ लाख टन साखर निर्यात होऊ शकली होती. यंदा परिस्थिती त्याहूनही गंभीर होण्याची चिन्हे आहेत. यंदा देशभरात २९५ ते ३०० लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. मात्र एकंदरीत पाहता आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर सध्या प्रति क्विंटल ३,६०० ते ३,७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. गेल्या वर्षी याच काळात हे दर ४,५०० रुपयांपर्यंत होते. यामुळे दरातील घसरण दिसून येत आहे.दरम्यान साखरेची निर्यात न झाल्यामुळे कारखान्यांकडे साठा पडून राहील. यामुळे कारखान्यांची तरलता कमी होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी थकण्याची शक्यता आहे. निर्यातीचे मार्ग लवकर मोकळे न झाल्यास साखर कारखाने मोठ्या आर्थिक संकटात सापडू शकतात. यावर्षी निर्यात कोटा वाढवून २० लाख टन करण्यात आला असला तरी आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निर्यातीत युद्धामुळे मोठी घट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साखरेचा पुरवठा वाढल्यामुळे दरावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. पूर्वी देशात साखरेचा वार्षिक खप सुमारे ३०० लाख टनांच्या आसपास होता. यावर्षातील पहिल्या सहा महिन्यांतील विक्रीचा कल पाहता यावर्षी साखरेचा एकूण खप २७० लाख टनांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे १३३ लाख टन साखर विक्री झाली आहे. पुढील काळात विक्री झाली तर वर्षभरातील खप अंदाजे २७० लाख टनांपर्यंत राहू शकतो, असा अंदाज साखर क्षेत्रातील अभ्यासक दिलीप पाटील यांनी व्यक्त केला आहे. देशातील अंदाजे साखर उत्पादन २९५ ते ३०० लाख टन अपेक्षित साखर निर्यात कोटा: २० लाख टन आतापर्यंत झालेली निर्यात : सुमारे ४ लाख टन एकूण अपेक्षित निर्यात (करारांमुळे): जास्तीत जास्त ५ लाख टन देशांतर्गत बाजारात राहणारी अतिरिक्त साखर : सुमारे १५ लाख टनमागील वर्षाची निर्यात स्थिती : सरकारने दिलेला निर्यात कोटा १० लाख टन आणि प्रत्यक्ष निर्यात ८ लाख टनसाखर उद्योगाला यंदा सुमारे २० लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी आहे; परंतु प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ सुमारे चार लाख टन साखरेचीच निर्यात झाली आहे. अगोदरच दर कमी होते, त्यात आता युद्धाच्या परिणाम निर्यातीवर होणार आहे. - दिलीप पाटील, सहअध्यक्ष, इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीजागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धांचा परिणाम साखर उद्योगावरही होणार असून, मध्य आशिया परिसरातील तणाव आणि सुएझ कालव्यातील वाहतुकीवरील परिणामामुळे आंतरराष्ट्रीय सामुद्री वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे साखरेच्या निर्यातीला फटका बसला आहे. - अजित चौगुले, कार्यकारी संचालक, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा)विमानांचे तिकीट दर ६० ते ८० टक्क्यांनी वधारलेइस्रायल-अमेरिका आणि इराण युद्धामुळे मध्यपूर्वेतील तणाव प्रचंड वाढला आहे. याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर झाला आहे. गेल्या आठवडाभरात भारतातून युरोपला जाणाऱ्या विमानांच्या भाड्यात ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून दुबई मार्गावरील तिकीट दर ६० ते ८० टक्क्यांनी वधारले आहेत. पुढील १५ दिवसांत प्रवास बुक करणाऱ्यांना भाडेवाढीचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार विमान उड्डाणे मर्यादित असल्याने भारत-दुबई कॉरिडॉरवर एकेरी प्रवासाचे भाडे ८० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. या आठवड्यात मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाली असून, त्यापैकी ५० ते ६५ टक्के उड्डाणे केवळ दुबई मार्गावरील आहेत. युरोपीय देशांचा विचार करता, जर्मनी आणि पोर्तुगालसाठीचे भाडेही प्रचंड वाढले आहे. दिल्ली-फ्रँकफर्ट मार्गावरील इकॉनॉमी क्लासचे सर्वात स्वस्त तिकीट तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे.युद्धामुळे राज्यातील औषध कंपन्यांना फटकाआखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे चटके वेगवेगळ्या देशांना आणि क्षेत्रांना बसायला सुरुवात झाली आहे. राज्यातील औषध कंपन्यांना अडीच हजार ते पाच हजार कोटींपर्यंत नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाने (फार्मेक्सिल) दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानातील औषध कंपन्यांची एकूण निर्यातीत ५.५८ टक्के भागीदारी आहे. संयुक्त अरब अमिरात (यूएई), सौदी अरब, ओमान, कुवेत आणि यमन यांसारख्या देशांतील प्रमुख बाजारपेठा या राज्यातील स्वस्त आणि जेनेरिक औषधांवर अवलंबून आहेत. जॉर्डन आणि लिबिया या देशांतही निर्यात वाढली आहे. सध्या युद्धामुळे आयात आणि निर्यात दोन्हींसाठी ४ हजार ते ८ हजार डॉलरपर्यंत अतिरिक्त शुल्क मोजावे लागत आहेत. त्यामुळे कंपन्यांवर मोठा दबाव वाढला आहे. पश्चिम आशिया संकटामुळे मार्चमध्ये निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.
आस्थापन खर्च कमी करण्यासाठी पदे रिक्त ठेवू नका
स्थायी समिती अध्यक्षांनी दिले पालिका प्रशासनाला निर्देशमुंबई : मुंबई महापालिकेत मागील चार वर्षांमध्ये प्रशासकाची सत्ता असल्यामुळे त्यांनी आपल्या काळात महापालिकेच्या कारभाराची घडीच विस्कटून टाकली. आजही अनेक विभाग आणि खात्यांमध्ये कर्मचारी,अधिकारी,अभियंते यांची अनेक पदे रिक्त आहे. जर ही पदेच रिक्त असतील तर त्या विभागाचे, खात्याचे काम कसे होईल आणि आम्हा नगरसेवकांची कामे तरी कशी होतील असा सवाल स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी केला. त्यामुळे आस्थापना खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये कपात करू नका असे निर्देश प्रशासनाला देत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी, त्यामुळे आता प्रत्येक खाते आणि विभाग याचा आढावा घेवून पदे भरण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन त्यांनी सदस्यांना दिले.मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पी उत्तर विभागाच्या विभाजनानंतर न व्याने निर्माण झालेल्या पी पूर्व विभागाकरता नव्याने निर्माण केलेले प्रशासकीय अधिकारी व सहायक मुख्य पर्यवेक्षक या संवर्गातील हंगामी पदे पुढे चालू ठेवण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला असता उबाठाच्या नगरसेविका श्रध्दा जाधव यांनी परवाना विभागातील अनेक पदे रिक्त आहेत, अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. प्रशासकीय अधिकारी नाहीत. मागील चार वर्षांत अनेक कर्मचारी व अधिकारी सेवा निवृत्त झाल्यानंतर तिथे कुणाला बढती गेली नाही कि त्या रिक्त पदांवर कुणी नवीन भरती केली गेली नाही. त्यामुळे याची चौकशी करून ही पदे भरण्याचा प्रयत्न व्हावा अशी मागणी केली. तर यावर बोलतांना सभागृहनेते गणेश खणकर यांनी विभागांमध्ये दोन दुय्यम अभियंता एक कनिष्ठ अभियंता अशी स्थिती आहे. त्यामुळे महापालिकेच्य विविध आस्थापनांमधील किती कर्मचारी,अधिकारी सेवा निवृत्त झाले आणि किती पदे भरली याची माहिती घ्यायला हवी. एवढेच काय तर लेखापरिक्षण विभागात १ मंजूर पदे आहेत,पण सध्या केवळ ४०० कर्मचारी कार्यरत आहेत. आज जलअभियंता, इमारत कारखाना विभागात कुणीही जायला तयार नाही. त्यामुळे ही परिस्थिती गंभीर आहे. तर भाजपचे प्रकाश दरेकर यांनी प्रशासनाची एवढी उदासिनका का सवाल करत मी ज्या प्रभाग समितीचा अध्यक्ष झालो आहे, तेथील प्रशासकीय कार्यालयांना प्रभारीच सहायक आयुक्त असल्याचे सांगितले. यावर झालेल्या चर्चेत यामिनी जाधव, डॉ सईदा खान यांनी भाग घेत महापालिकेतील रिक्त पदांबाबत आणि कामकाजावर होणाऱ्या परिणामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी यासर्व खात्यांचा सखोल आढावा घेतला जाईल. स्थायी समितीच्या अखत्यारित महापालिका सचिव आणि मुख्य लेखापरिक्षक हे विभाग आहेत. १९९७ पासून मी नगरसेवक असून त्यातील दोन वर्षे सोडली तर स्थायी समिती सदस्य होतो. त्यावेळी तत्कालिन मुख्य लेखापरिक्षक हे स्थायी समिती सदस्यांना अर्थसंकल्प समजून सांगायचे. महापालिका सचिव विभागात अजेंडा वाटताना विभागाची त्रेधातिरपीट उडत आहे. त्यामुळे महापालिकेत आस्थापना खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची पदे भरली जात नसून यासाठी कडक पावले उचलावीच लागतील असेही त्यांनी सांगितले.
Donald Trump : ट्रम्प यांच्या हत्येच्या कट रचणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला अटक
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची हत्या करण्याचा कट केल्याबद्दल इराणशी संबंधित असलेल्या पाकिस्तानी नागरिकाला दोषी ठरवण्यात आले आहे.
Karad News : उंडाळे येथे मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दोन मजुरांचा मृत्यू
Karad News :
Alandi: आज सकाळी ११ वाजता मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या नेतृत्वात नगरपरिषद अधिकारी, आळंदी दामिणी महिला पोलीस पथक आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी यांनी संस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत अनेक गंभीर त्रुटी आढळल्या.
Mamata Banerjee : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मास्टरस्ट्रोक ! केली ‘ही’मोठी घोषणा
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मास्टरस्ट्रोक खेळला आहे.
उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’
मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला मोर्चातर्फे उद्या रविवारी, ८ मार्च रोजी ‘साडी वॉकाथॉन – तिच्या पावलात शक्ती २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी आणि स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम भाजप उत्तर-पश्चिम जिल्हा मुंबई महिला मोर्चातर्फे आयोजित करण्यात आला असून वॉकाथॉनची सुरुवात सकाळी ६ वाजता आरे चेक नाका, वाघदेवी मंदिराजवळ, युनिट १० मैदान येथून होणार आहे.या उपक्रमाचा उद्देश परिसरातील महिलांना एकत्र आणून त्यांच्या शक्ती, एकता आणि नेतृत्वाचा गौरव करून त्यांना प्रोत्साहित करणे हा आहे.
Rajya Sabha elections: राज्यसभा निवडणूक कशी होते? मते कशी मोजली जातात? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Rajya Sabha elections: लोकसभा निवडणुकीत १८ वर्षांवरील नागरिक थेट मतदान करतात, मात्र राज्यसभेत मतदान करण्याचा अधिकार फक्त राज्य विधानसभेच्या सदस्यांना असतो. हे मतदान एकल हस्तांतरणीय मताद्वारे (सिंगल ट्रान्सफरेबल व्होट) पद्धतीने होते.
Maoists Surrender : तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्यासमोर 130 माओवाद्यांचे आत्मसमर्पण
केंद्र सरकारने दिलेल्या ३१ मार्चच्या अंतिम मुदतीपूर्वी शनिवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांच्यासमोर १३० माओवाद्यांनी आत्मसमर्पण (Maoists Surrender) केले आहे.
'फडणवीस सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पाळले, उद्धव सरकारने शेतकऱ्यांना कवडीचीही मदत दिली नव्हती'
मुंबई : अर्थसंकल्प आणि शेती यातील शून्य ज्ञान असलेले संजय राऊत शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर टीका करत आहेत हा मोठा विनोद आहे. नजिकच्या काळात कुठल्याही निवडणुका नसतानाही भाजपा महायुती सरकारने कर्जमुक्तीचे वचन पाळले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकऱ्यांची फसवणूक करणारे सरकार होते अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मविआच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शेतक-यांना फुटकी कवडी देखील देण्यात आली नव्हती याची आठवण करून देत बन यांनी कर्जमाफीची अंमलबजावणी होणार असल्याची ग्वाही दिली.बन म्हणाले की, अर्थसंकल्पात शेतक-यांना दिलासा देत ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकर्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी घोषित करण्यात आली आहे. भाजपा महायुती सरकार हे मविआ सरकार सारखे कागदी घोडे नाचवणारे सरकार नसून शब्दाला जागणारे सरकार आहे. अर्थसंकल्पातील घोषणा अंमलात नक्की आणली जाणार अशी ग्वाही बन यांनी दिली. मविआ सरकराने केलेली कर्जमाफी फसवी होती. कोकणात वादळामुळे पिडीत शेतकऱ्यांना दिलेले मदतीचे आश्वासनही हवेत विरले होते असा टोला त्यांनी लगावाला. याउलट एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कर्जमाफी केली. भाजपा महायुती सरकारने शेतक-यांना मोफत वीज, सिंचन सुविधा, शेततळे, कृषी पंप, सौर पंप, शेतकऱ्यांना अवजारे अनुदानावर देणे यांसारख्या सुविधा दिल्या. शेतक-यांच्या उत्पादनांना हमीभाव मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती नवी योजना सुरू केली होती याची माहिती राऊतांनी द्यावी असे आव्हान ही त्यांनी दिले.विरोधकांना चपराक लगावणारा अर्थसंकल्पराज्यातील सर्वसामान्य जनतेचे हित साधत राज्याला विकासाच्या मार्गावर गतीने घेऊन जाणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे. सर्वदूर विकास आणि राज्याची प्रगती पाहता राऊत आणि आदित्य ठाकरे यांची पोटदुखी आणिकच बळावली असल्याचा टोमणा बन यांनी लगावला. पायाभूत सुविधा विकास हा गतीने करण्यासाठी या अर्थसंकल्पात अनेक नव्या प्रकल्पांची घोषणा आणि जुने प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. मात्र मुंबई महापालिकेमध्ये २५ वर्षे ठेकेदारांचे भले करणा-या उबाठा गटाला सगळीकडे ठेकेदारच दिसत असल्याने हा ठेकेदारांचा अर्थसंकल्प असल्याचे भासते अशी खिल्ली त्यांनी उडवली. हा अर्थसंकल्प ठेकेदारांचा नाही, तर विरोधकांना चपराक लगावणारा अर्थसंकल्प आहे अशी टीका त्यांनी केली.महायुतीचे सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच रहाणारभाजपा महायुतीचे सरकार कायम लाडक्या बहिणींच्या मागे खबंरपणे उभे आहे. लखपती दीदी, लाडकी बहीण योजनेने महिलांचा स्वाभिमान जपला. या उलट उबाठा गट आणि काँग्रेसच्या वतीने लाडकी बहीण योजना बंद करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र लाडकी बहीण योजना ना उद्धव ठाकरे, ना संजय राऊत, ना काँग्रेसचे सुनील केदार बंद करू शकतात असे बन यांनी ठणकावून सांगितले.
आनंदाची बातमी, मुंबईचे ससून बंदर होणार 'ग्लोबल'
जगातील सर्वोत्तम बंदर बनविण्याचा मंत्री नितेश राणे यांचा संकल्प; फिनलंडच्या मदतीने कायापालट करणारमुंबई : मुंबईतील ऐतिहासिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बंदर बनविण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. ससून डॉकचा चेहरामोहरा बदलण्यासाठी फिनलंडमधील कंपन्यांसोबत महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाने सामंजस्य करार केला असून, यामुळे हे बंदर आधुनिक, स्वच्छ आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत होईल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमात फिनलंडमधील हेल्वर, मिरासिस आणि रिव्हर रीसायकल या तीन कंपन्यांसोबत हा करार करण्यात आला. याप्रसंगी फिनलंडचे वाणिज्यदूत एरिक अफ हॅलोस्ट्रॉम, इंग्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाचे राज्य सचिव जुका सोलोवारा, राज्याचे मत्स्य व्यवसाय सचिव एन. रामास्वामी, आयुक्त विजय सूर्यवंशी, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपाले आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले की, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीचा जुना ससून डॉक आणि केंद्र-राज्य शासनाच्या अखत्यारीतील नवीन डॉक हे मासेमारी समुदायासाठी महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. येथे १ हजार ५६० नोंदणीकृत नौका असून वार्षिक सरासरी ५० ते ६० हजार मेट्रिक टन मासळीची उलाढाल होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ससून डॉकला जागतिक मानकांनुसार आदर्श बंदर बनवणे हे आमचे ध्येय आहे, असे त्यांनी सांगितले. ससून डॉक परिसरात गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने नेट मेंडिंग शेड, वर्कशॉप, भूमिगत पाण्याची टाकी, संरक्षण भिंत आणि सुरक्षा रक्षक घरांचे नूतनीकरण आदी कामांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बर्फ संयंत्र, घाटाच्या भिंतीचे मजबुतीकरण, मच्छिमारांसाठी विश्रांती कक्ष आणि आधुनिक लिलाव हॉलची कामे प्रगतीपथावर आहेत.https://www.youtube.com/shorts/cC-VFxkGXVsप्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर होणारफिनलंडमधील तीनही कंपन्यांच्या सहकार्याने ससून डॉक अधिक सुरक्षित आणि आधुनिक केले जाणार आहे. यात प्रामुख्याने प्लास्टिक कचरा पुनर्वापर, टाकून दिलेल्या मासेमारी जाळ्यांचे व्यवस्थापन आणि प्रगत नेट दुरुस्ती प्रणालीवर भर दिला जाईल. तंत्रज्ञानाचा विस्तार आणि डिजिटायझेशनद्वारे मच्छिमार समुदायाची प्रगती साधण्याचा शासनाचा मानस असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. ससून डॉकला केवळ पायाभूत सुविधांपर्यंत मर्यादित न ठेवता, ते प्रगती, नावीन्य आणि समृद्धीचे प्रतीक बनविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पायाभूत सुविधांच्या करारांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्यांचे सरकारी यंत्रणेमार्फत सखोल स्क्रिनिंग (तपासणी) केल्यास भविष्यातील महागडे लवाद वाद टाळता येतील आणि सार्वजनिक तिजोरीतील हजारो कोटी रुपये वाचवता येतील, असे प्रतिपादन भारताचे माजी सरन्यायाधीश उदय लळित (Uday Umesh Lalit) यांनी शनिवारी केले.
Pune Crime News : पुणे शहरात धुमाकूळ घालणाऱ्या परप्रांतीय मोबाईल चोरांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.
Hurun Rich List 2026: एकूण भारतीय अब्जाधीशांची संपत्ती मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १०% वाढून ११२.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यातील १९९ अब्जाधीशांची संपत्ती वाढली, तर १०९ जणांच्या संपत्तीत घट किंवा स्थिरता दिसून आली.
Dr. Manisha Jejurkar : प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या
शहरातील प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर (Dr. Manisha Jejurkar) यांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे. या घटनेमुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दुबई विमानतळ बंद, विमानवाहतूक ठप्प
दुबई : अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध पश्चिम आशियात सुरू आहे. इराणने अमेरिकेच्या सैन्याचे तळ ज्या देशांमध्ये आहेत त्या अरब देशांतील महत्त्वाच्या ठिकाणांनाही लक्ष्य केले आहे. या युद्धाचे परिणाम दिसू लागले आहे. पश्चिम आशियात २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या युद्धाने आता आठव्या दिवसांत प्रवेश केला आहे. दोन्ही बाजू आक्रमक असून एकमेकांविरोधात हल्ले करत आहेत. युद्ध सुरू असतानाच शत्रूचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्यासाठी अपप्रचाराची मोहीम दोन्ही बाजूने जोरात चालवली जात आहे. या अशांत आणि अस्थिर वातावरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच दुबईतून एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे.दुबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. दुबईच्या विमानतळावर सकाळीच इराणच्या क्षेपणास्त्राचे तुकडे पडले. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दुबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील आदेशापर्यंत बंद ठेवत असल्याचे जाहीर करण्यात आले.इराणने दुबईवर सकाळी क्षेपणास्त्राद्वारे हवाई हल्ला केला, त्यावेळी क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्राने इराणचे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले. या नष्ट झालेल्या क्षेपणास्त्राचे तुकडे दुबईच्या विमानतळावर पडले. क्षेपणास्त्राचे तुकडे पडताच विमानतळाव भीतीचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत दुबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठेवत असल्याचे जाहीर केले. विमानतळ बंद असल्यामुळे या विमानतळावरून होणारी विमानवाहतूक ठप्प आहे. अखेरच्या वृत्तानुसार विमानतळ अंशतः सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांना आपल्या विमान कंपनीशी संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जोपर्यंत तुमची एअरलाईन स्वतः संपर्क करून फ्लाईट कन्फर्म असल्याचे सांगत नाही, तोपर्यंत विमानतळाच्या दिशेने येऊ नका, असे प्रवाशांना सांगण्यात आले आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे उड्डाणांच्या वेळा सतत बदलत आहेत. ठराविक उड्डाणे दुबई आंतरराष्ट्रीय आणि अल मकतूम विमानतळावरून ऑपरेट केली जात आहेत.
Iran Israel War : इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी फेटाळून लावली अमेरिकेची बिनशर्त आत्मसमर्पणाची मागणी
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेच्या बिनशर्त आत्मसमर्पणाच्या मागण्यांना स्पष्टपणे नाकारले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अशी अपेक्षा करणे हे एक स्वप्न आहे जे कधीही पूर्ण होणार नाही. सरकारी टीव्हीवर प्रसारित झालेल्या रेकॉर्ड केलेल्या संदेशात त्यांनी अमेरिकेवर तीव्र हल्ला चढवला आणि म्हटले की इराण कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, इराण पूर्णपणे शरणागती पत्करत नाही तोपर्यंत राजनैतिक संधी नाही. ट्रम्प म्हणाले की, ते बिनशर्त शरणागती पत्करल्याशिवाय इराणशी वाटाघाटी करणार नाहीत. अमेरिकन अधिकाऱ्यांनी इराणला येणाऱ्या बॉम्बस्फोट मोहिमेचा इशाराही दिला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पुढील हल्ला आठवडाभर चाललेल्या संघर्षातील सर्वात तीव्र असेल. अमेरिकेने इस्रायलला १५१ दशलक्ष डॉलर्स किमतीची नवीन शस्त्रे विकण्यासही मान्यता दिली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केले आहेत, ज्यामध्ये इराणच्या लष्करी क्षमता, नेतृत्व आणि अणुकार्यक्रमाला लक्ष्य केले आहे.इराणच्या संयुक्त राष्ट्रांच्या राजदूताने अमेरिकेला प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, देश स्वतःचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल. शनिवारी (७ मार्च) सकाळी इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्येही मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. इराणकडून क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे लोक इस्रायलमधील बॉम्ब आश्रयस्थानांकडे पळून जात आहेत. इस्रायली आपत्कालीन सेवांनी हल्ल्यांमुळे कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त दिलेले नाही.
Middle East Crisis:
Maharashtra Politics :
Mumbai Metro : महिला दिनी मेट्रोची ‘कमान’ महिलांच्या हाती
मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) कडून एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबई मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाईन) वरील मरोळ नाका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ही दोन महत्त्वपूर्ण मेट्रो स्थानके ८ मार्च २०२६ रोजी पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांकडून संचलित केली जाणार आहेत. शहरी वाहतूक क्षेत्रामध्ये महिलांचा वाढता सहभाग आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.या दोन्ही स्थानकांवरील दैनंदिन कामकाजामध्ये स्थानक नियंत्रण, तिकीटिंग, प्रवासी सहाय्य, सुरक्षा व्यवस्था, देखभाल सहाय्य आणि हाऊसकीपिंग अशा विविध जबाबदाऱ्या महिलांकडे असतील. दिवसभरातील वेगवेगळ्या शिफ्टमध्ये मिळून एकूण ८५ महिला कर्मचारी या स्थानकांचे कामकाज सांभाळतील.याशिवाय, अॅक्वा लाईनच्या संचालनामध्ये २७ महिला ट्रेन ऑपरेटर्स (मेट्रो पायलट) महत्त्वाची भूमिका बजावत असून त्या नियमितपणे मेट्रो गाड्यांचे संचालन करत आहेत. एकूणच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये १,३८८ महिला कर्मचारी विविध स्तरांवर कार्यरत आहेत. यामध्ये कार्यालयीन कर्मचारी तसेच ऑपरेशन्स, तिकीटिंग, हाऊसकीपिंग आणि सुरक्षा सेवांमध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
‘वन नेशन-वन रेशन’मध्ये महाराष्ट्र अव्वल
- १८.९७ लाख परप्रांतीयांनी घेतले धान्य; शिवभोजन थाळीचाही ४ कोटींचा टप्पा पारमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यात महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी (२०२५-२६) अहवालानुसार, आतापर्यंत तब्बल १८.९७ लाख परराज्यांतील शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्य उचलले असून, केंद्र सरकारच्या या अंत्योदय योजनेचा मोठा आधार स्थलांतरित श्रमिकांना मिळाला आहे.रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीय मजुरांना अन्नासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी 'आंतरराज्यीय पोर्टेबिलिटी' योजना सुरू करण्यात आली. अहवालानुसार, उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यांतील १८.९७ लाख कार्डधारकांनी महाराष्ट्रातून धान्य घेतले. याउलट, महाराष्ट्रातील १.४० लाख कार्डधारकांनी राज्याबाहेर असताना या सुविधेचा लाभ घेतला आहे. रेशन दुकानांवरील पारदर्शक ऑनलाईन यंत्रणेमुळे हे शक्य झाले आहे.राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात सकस आहार देणाऱ्या ‘शिवभोजन’ योजनेनेही उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. अहवालातील आकडेवारीनुसार, राज्यात सध्या १ हजार ८७४ शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. नोव्हेंबर २०२५ पर्यंत तब्बल ४.०९ कोटी शिवभोजन थाळ्यांचे वाटप पूर्ण झाले आहे.अहवालातील ठळक निष्कर्ष :महाराष्ट्रात रेशन घेणारे परप्रांतीय - १८.९७ लाखइतर राज्यांत रेशन घेणारे महाराष्ट्रीयन - १.४० लाखएकूण शिवभोजन केंद्रे - १,८७४वाटप झालेल्या एकूण थाळ्या - ४.०९ कोटी
केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांनी कौशाम्बीसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे औमासीच्या विमानतळावर त्यांना हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
Pune Court News :
Jay Pawar : रोहित पवारांनंतर आता जय पवार ॲक्टिव्ह; पत्रकार परिषदेद्वारे करणार ‘हा’मोठा खुलासा
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी VSR Ventures कंपनीबाबत गंभीर आरोप केल्यानंतर आता अजित पवारांचे कनिष्ठ चिरंजीव जय पवार (Jay Pawar) हे देखील मैदानात उतरले आहेत.
Team India : मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२३ च्या फायनलवेळी भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, ते हॉटेल यावेळी जाणीवपूर्वक टाळण्यात आले आहे.
मोठी घडामोड..! राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार; आमदार-खासदारांच्या बैठकांचा धडाका
Politics News
US-Israel war against Iran: ट्रम्प यांनी सुरुवातीला दोन-तीन दिवसांत युद्ध संपेल असे सांगितले होते, मात्र दुसऱ्याच दिवशी हा अंदाज बदलत चार आठवडे लागतील असे म्हटले. व्हाईट हाऊसचा अधिकृत अंदाज चार ते सहा आठवड्यांचा आहे.
Prize Money : या स्पर्धेसाठी आयसीसीने एकूण १३.५ मिलियन डॉलर्स (सुमारे १२३.७७ कोटी रुपये) बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. ही रक्कम २०२४ च्या तुलनेत २० टक्क्यांनी अधिक आहे.
Anna Hazare : अण्णा हजारेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र; युद्ध परिस्थितीवर मांडली परखड भूमिका
Anna Hazare : राळेगणसिद्धीचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून इराण-इस्रायल संघर्षावर चिंता व्यक्त केली आहे.
Aaditya Thackeray : चर्चेनंतरच उमेदवारीबाबत एकमत झाले; आदित्य ठाकरेंनी केले स्पष्ट
महाविकास आघाडीने महाराष्ट्रातून राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे(शप) अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी देण्याबाबत एकमत झाले असल्याचे ठाकरेसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सांगितले.
Nashik Bribe: अटक करण्यात आलेल्यांमध्ये नाशिक विभागातील राज्य कर (जीएसटी) कार्यालयाचे उपायुक्त सोमनाथ दत्तू पगे (वय ४७), सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंडे (वय ५५) आणि खासगी दलाल अमित हिरामण जाधव (वय ३६) यांचा समावेश आहे.
मुंब्रा : शिळ डायघर भागात गोळीबार, दोघे जखमी
मुंब्रा : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये शिळ डायघर भागात गोळीबार झाला. मुंब्रा कौसा येथील बांधकाम व्यावसायिक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान (४५) यांच्या घरावर घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपीला मुंब्रा पोलीस पकडण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने पाच गोळ्या झाडल्या. या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले. जखमींवर काळसेकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी (२८) असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे. आरोपी मुंब्रा येथील महापे रोडवरील केला कंपाउंडमधील अमीन पॅलेसमध्ये राहतो. गोळीबार करणाऱ्याच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौसा परिसरातील अरमान को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमध्ये बांधकाम व्यावसायिक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान हे राहतात. शनिवारी पहाटे ४.५४ वाजता त्यांच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. गोळीबाराची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सावंत आणि सोनवणे तसेच बीट क्रमांक तीनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी नदीम खान यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कारवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या, तर एक गोळी हवेत फायर करण्यात आली. पोलिसांनी लगेच आरोपींचा पाठलाग सुरू केला. शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आचार गल्ली येथे पोलिसांनी शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी याला पकडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याने पोलिसांच्या दिशेने पाच गोळ्या झाडल्या. या गोळीबारात तेथे उपस्थित असलेले दोन नागरिक जखमी झाले असून त्यांना काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. एकाच्या पोटाला गोळी चाटून गेली आहे तर, दुसऱ्याच्या बोटाला गोळी लागली.गोळीबार प्रकरणी पोलिसांनी शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी (२८) याला अटक केली असून त्याच्याकडे असलेली एक बंदूक आणि चार मॅगझिन जप्त केल्या आहेत. नदीम खान यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असून शांत आहे.
Sunetra Pawar : सरकार महिलांच्या मदतीसाठी कटीबध्द आहे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केले स्पष्ट
राज्य सरकार महिलांच्या सुरक्षा, शिक्षण, रोजगार आणि आर्थिक मदत मजबूत करण्यासाठी योजना आणत राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी स्पष्ट केले आहे.
Glenn Phillips Statement : अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा स्टार खेळाडू ग्लेन फिलिप्स याने बुमराहच्या कामगिरीवर आणि त्याच्या त्रुटींवर बोट ठेवले आहे.
मोठा अपघात..! भरधाव BMW कारची ट्रकला जोरदार धडक; ४ मित्रांचा जागीच अंत
BMW Accident : लातूरच्या औसा-तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री BMW कार आणि ट्रकच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू झाला.
पालकांनो लक्ष द्या! पहिलीच्या प्रवेशासाठी वयाची अट बदलली; आता ‘हे’वय असल्याशिवाय ॲडमिशन नाही
School Admission Rules : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून पहिलीच्या प्रवेशासाठी मुलाचे वय ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ६ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
Petrol Diesel Price Hike : इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम पुण्याच्या इंधन पुरवठ्यावर झाला आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना आगाऊ पैसे भरण्याचे निर्देश दिले
Iran Israel War : सॉरी, आम्ही यापुढे हल्ला करणार नाही; इराणच्या पंतप्रधानांनी मागितली माफी
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांनी इस्रायल आणि अमेरिकेसोबतच्या युद्धादरम्यान शेजारी देशांवर झालेल्या हल्ल्यांबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, इराणवर प्रथम हल्ला झाला नाही तर पुढे कोणत्याही देशावर हल्ला केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.इराणच्या सरकारी टीव्हीवर प्रसारित झालेल्या भाषणात पेझेशकियन म्हणाले की, “माझ्या वतीने आणि इराणच्या वतीने शेजारी देशांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल मी माफी मागतो. अंतरिम नेतृत्व परिषदेत निर्णय घेण्यात आला की, पुढे शेजारी देशांवर हल्ले केले जाणार नाहीत आणि त्या देशांकडून इराणवर हल्ला झाला तरच प्रत्युत्तर दिले जाईल.”इराण कधीही माघार घेणार नाही :मात्र त्यांनी इराण कधीही माघार घेणार नाही, असे ठामपणे सांगितले. “इराणी जनतेने शरणागती पत्करावी अशी शत्रूंची इच्छा आहे, पण ती इच्छा त्यांना त्यांच्या कबरीतच घेऊन जावी लागेल,” असे त्यांनी सांगितले.‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत युद्धाला सुरुवात :दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर समन्वित हवाई हल्ले केले होते. अणु चर्चेतील अडथळे आणि इराणने पुन्हा अणु कार्यक्रम सुरू केल्याच्या आरोपांनंतर ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत हे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये राजधानी तेहरानसह अनेक शहरांना लक्ष्य करण्यात आले होते.या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी, त्यांची पत्नी, मुलगी, जावई आणि नात यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.युद्धाचे पडसाद :यानंतर इराणने इस्रायल आणि अमेरिकेशी संबंधित ठिकाणांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. विशेषतः दुबई, अबूधाबी, कतार, कुवेत आणि बहरीन या आखाती देशांमध्ये मोठे नुकसान झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले होते.तसेच दुबईतील पाम जुमेराह परिसर आणि बर्ज अल अरब लक्झरी हॉटेलजवळही हल्ले झाल्याची माहिती आहे. ड्रोनचे अवशेष पडल्यामुळे दुबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासात आग लागल्याची घटनाही घडली. बहरीनमध्ये सरकारी तेल शुद्धीकरण प्रकल्पावरही क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे वृत्त आहे.कतारच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशावर १४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि चार ड्रोन डागण्यात आले, त्यापैकी एक क्षेपणास्त्र अल-उदीद कतारी लष्करी तळावर आदळले.सौदी अरेबियाचा इराणला इशारा :दरम्यान, सौदी अरेबियाने इराणला इशारा दिला आहे. संरक्षणमंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान यांनी इराणने चुकीचा अंदाज लावू नये, असे सांगत अनेक क्षेपणास्त्र हल्ले आणि ड्रोन हल्ले परतवून लावल्याचा दावा केला आहे.जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाने या आठवड्यात पूर्वेकडील रास तनुरा तेल शुद्धीकरण प्रकल्पावर दोन ड्रोन हल्ल्यांची नोंद केल्याचेही सांगितले जात आहे.
Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले
शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी होती. मिळालेल्या माहितीनुसार हा भूकंप सिकर जिल्हा आणि आसपासच्या भागात सर्वात जास्त जाणवला. तथापि, सौम्य भूकंपामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झालेले नाही.राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र जयपूरच्या वायव्येस सुमारे ६९ किलोमीटर अंतरावर, सुमारे पाच किलोमीटर खोलीवर होते. सकाळी ६:३० च्या सुमारास आलेला हा भूकंप फक्त काही सेकंद टिकला.वृत्तानुसार, खाटूश्यामजी, पलसाणा, धिंगपूर आणि सीकर जिल्ह्यातील आसपासच्या भागात लोकांना सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. सुमारे एक-दोन सेकंद चाललेल्या या भूकंपामुळे लोक घराबाहेर पडले. पलसाणा परिसरातील अनेक रहिवाशांनी सांगितले की भूकंपाच्या वेळी त्यांच्या घरांचे दरवाजे आणि खिडक्या हादरल्या.
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना २ लाखपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आल्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात असून, या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर देत महत्वाची माहिती दिली आहे.
Suhana Khan या विवाह सोहळ्याला सुहाना तिचे आई-वडील शाहरुख खान आणि गौरी खान यांच्यासोबत उपस्थित होती. लग्नसमारंभातील तिचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Iran Israel War : अमेरिकेची इराणला धमकी; अमेरिका करणार आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला सुरूच आहे. इराणही या हल्ल्यांना चोख उत्तर देत आहे. अशातच आता अमेरिकेने पुन्हा एकदा इराणला मोठी धमकी दिली आहे. अमेरिकेने आता इराणविरुद्ध सैन्य कारवाई आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.आज रात्री म्हणजेच शनिवार ७ मार्च रोजी इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होणार अशी धमकीच अमेरिकेचे ट्रेजरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी दिली आहे.काय म्हणाले अमेरिकेचे ट्रेजरी सचिव ?एका कार्यक्रमात स्कॉट बेसेंट म्हणाले की, जसे सेक्रेटरी हेगसेथ, जनरल केन आणि राष्ट्रपतींनी म्हटल्याप्रमाणे आज रात्री आमची सर्वात मोठी बॉम्बहल्ला मोहीम असेल आणि आम्ही इराणी क्षेपणास्त्र लॉन्चर आणि क्षेपणास्त्र उत्पादक कारखान्यांना सर्वात जास्त नुकसान पोहोचवू. अमेरिकन सैन्य इराणच्या क्षमतांमध्ये लक्षणीय घट करत आहे. इराण दोन मोर्चांवर लढत आहे आणि तिथे अमेरिकेची मोहीम खूप प्रभावी ठरली आहे. आम्ही खूप प्रमाणात इराणला कमकुवत केले आहे. आमची मोहीम जबरदस्त सुरू आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.इराणच्या सर्वोच्च नेत्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प म्हणाले ...इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांच्या हातात इराणची सूत्रे गेली आहे. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्षेप घेतला. इराणचा नेता लोकशाहीवादी असावा हे गरजेचे नाही, कुठल्याही धार्मिक नेत्याच्या हाती सत्ता राहिली तरी त्याबाबत हरकत नाही असं ट्रम्प यांनी स्पष्ट केले. इराणमध्ये निष्पक्ष आणि न्यायपूर्ण वागेल असा नेता महत्त्वाचा आहे. तो व्यक्ती कोण यावर निर्भर करते. मला धार्मिक नेत्यांची समस्या नाही. मी अनेक धार्मिक नेत्यांसोबत काम करतो. जो चांगले काम करेल आणि अमेरिका इस्रायलसोबत चांगले संबंध ठेवेल असा नेता हवा असंही ट्रम्प यांनी म्हटलं.
Akhilesh Yadav on Nitish Kumar: नितीश कुमार पंतप्रधानपदाचे दावेदार?; अखिलेश यादव नेमकं काय म्हणाले?
Akhilesh Yadav on Nitish Kumar: नितीश कुमार हे भारतीय राजकारणातील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत आणि त्यांनी बिहारच्या राजकारणात बराच काळ महत्त्वाची भूमिका बजावली आहे. म्हणूनच, जर त्यांना राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी दिली गेली तर ते त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक नैसर्गिक आणि सन्माननीय टप्पा असेल. जर संधी मिळाली तर नितीश कुमार यांनी पंतप्रधान बनूनच निवृत्त […]
Gas Cylinder Price Hike :देशभरात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ
- घरगुती आणि कमर्शिअल दोन्हीचे दर वाढलेमुंबई : देशभरात घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही गॅस सिलेंडरच्या दरात आज, शनिवारपासून (७ मार्च २०२६) दरवाढ करण्यात आली आहे. घरगुती वापराचा १४.२ किलोच्या सिलेंडरचे दर ६० रुपयांनी वधारले असून व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किंमतीत ११५ रुपयांची वृद्धी करण्यात आली आहे.देशात घरगुती स्वयंपाक गॅस सिलेंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही ११५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान व्यावसायिक आस्थापनांवर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये १४.२ किलो घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ८५३ रुपयांवरून ९१३ रुपये झाली आहे. मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरची नवीन किंमत ९१२.५० रुपये झाली असून पूर्वी ती ८५२.५० रुपये होती. तर चेन्नईमध्ये किंमत ८६८.५० रुपयांवरून ९२८.५० रुपये झाली आहे. हे सुधारित दर आजपासून लागू झाले आहेत.यासोबतच व्यवसायांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये गॅस सिलेंडरची किंमत १७६८.५० रुपयांवरून १८८३ रुपये झाली आहे. तर मुंबईमध्ये १७२०.५० रुपयांवरून १८३५ रुपये झाली आहे. तसेच कोलकात्यात सिलेंडरचे दर १८७५.५० रुपयांवरून १९९० रुपये झाले असून चेन्नईमध्ये १९२९ रुपयांवरून २०४३.५० रुपये झाली आहे.यापूर्वी एप्रिल २०२५ पासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे या ताज्या दरवाढीचा घरगुती ग्राहक तसेच व्यावसायिक वापरकर्त्यांवर मोठा आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
Celina Jaitly post : पतीवर हिंसाचाराचे आरोप केल्यानंतरअभिनेत्री सेलिना जेटली हिने आणखी पोस्ट सोशल मीडियावरुन शेअर केली आहे.
Women's Day : जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ
- आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मानमुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ८ मार्च रोजी महिला सक्षमीकरण आणि आरोग्य संरक्षणासाठी राज्यभरात विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येत आहे. महिलांच्या आरोग्य हक्कांना बळ देत गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी राज्यव्यापी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ, होत आहे. या दिवशी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकाराने हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम रविवार, ८ मार्च २०२६ रोजी मुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॅाईट, मुंबई येथे दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ :गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राष्ट्रीय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेचा राज्यव्यापी शुभारंभ महिला दिनानिमित्त होत आहे. १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना ‘गार्डसिल-४’ या लसीचा एक मोफत डोस देण्यात येणार आहे. राज्यातील एकूण ९ लाख ८४ हजार ४१४ मुलींना या मोहिमेचा लाभ मिळणार असून लसीकरण पूर्णपणे मोफत व पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात होणार आहे.भारतामध्ये महिलांमधील कर्करोगांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असून दरवर्षी सुमारे ८० हजार नवीन रुग्ण आढळतात व ४२ हजारांहून अधिक मृत्यू होतात. एचपीव्ही प्रकार १६ व १८ पासून संरक्षण देणारी ही लस अत्यंत प्रभावी मानली जाते. ही मोहीम सलग तीन महिने विशेष अभियान म्हणून राबविण्यात येणार असून त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग होईल. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण केले जाईल. सर्व लाभार्थ्यांची नोंदणी व प्रमाणपत्र वितरण केंद्र शासनाच्या U-WIN या डिजिटल पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे.आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव :जागतिक महिला दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला डॉक्टर्स, स्त्रीरोग तज्ज्ञ, स्त्री शल्यचिकित्सक, परिचारिका, आरोग्य सेविका, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामीण व दुर्गम भागात मातृत्व, बाल आरोग्य, कर्करोग प्रतिबंध आणि जनजागृती मोहिमांमध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेचा विशेष गौरव करण्यात आला.महिला सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समानता आणि आरोग्य हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी हे उपक्रम प्रेरणादायी ठरणार असून “महिलांच्या स्वप्नांना बळ देऊया, उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवूया!” या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे ठरतील, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
Force 3 Movie: ‘फोर्स 3’चित्रपटाच्या शूटिंगला सुरू; जॉन अब्राहमसोबत झळकणार ‘हा’अभिनेता
Force 3 Movie: 'फोर्स 3'चे पहिले शेड्यूल गुजरातमध्ये होत आहे. 'फोर्स' फ्रँचायझीचा 'फोर्स 3' हा तिसरा भाग आहे.

26 C