छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीच्या दिवशी सकाळपासूनच अनेक ठिकाणी राडा झाल्याचे पाहायला मिळाले. असाच आणखी एक प्रकार महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये पाहायला मिळाला. येथे वंचित बहुजन आघाडीच्या पॅनलला पराभूत घोषित करण्यात आल्यानंतर ईव्हीएम मशीन बंद असल्याचा आरोप वंचितच्या उमेदवाराने केला. त्यानंतर हा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 24 इथला निकाल जाहीर झाला. या ठिकाणी बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या बहीण गंगाबाई भीमराव भागुरे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांच्यासोबत कामलाताई रामचंद्र नरोटे, मुक्ता किसन ठुबे आणि सुनील देवदास जगताप हे संपूर्ण भाजपचे पॅनल विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु, गंगाबाई भागुरे यांच्या विज्यावर वंचितचे उमेदवार सतीश गायकवाड यांनी आक्षेप घेतला. वंचितचे उमेदवार सतीश गायकवाड यांनी मतमोजणी केंद्रावर एक तास मशीन बंद असल्याचा दावा केला. यावेळी मोतमोजणी केंद्रावर गडबड झाली आणि पोलिस तसेच वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाल्याचे पाहायला मिळाले. वंचितच्या कार्यकर्त्यांनी असाही आरोप केला की, वंचितचे पॅनल विजयी घोषित करण्यात आले होते. पण तिथे भाजपच्या उमेदवारांनी फेर मतदान करण्याची मागणी केली. त्यानंतर जिंकलेले वंचितचे पॅनल पराभूत घोषित करण्यात आले. त्यामुळे वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या केले.
राज्यातील मुंबईसह विविध महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अजित पवार यांनी संयमी आणि समतोल भूमिका मांडत प्रतिक्रिया दिली आहे. निकाल काहीही असो, जनतेचा निर्णय अंतिम आणि सर्वोच्च असतो, असा स्पष्ट संदेश त्यांनी आपल्या पोस्टमधून दिला आहे. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतानाच जिथे अपेक्षित यश मिळाले नाही, तिथे आत्मपरीक्षण करून नव्या जोमाने काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेकडे केवळ राजकीय भाष्य म्हणून नव्हे, तर पुढील राजकीय वाटचालीचा संकेत म्हणून पाहिले जात आहे. अजित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये सर्वप्रथम जनतेच्या निर्णयाला नतमस्तक होत, जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे आणि तो आम्ही पूर्ण आदरानं स्वीकारतो, असे ठामपणे नमूद केले आहे. निवडणुकीत विजय मिळवलेल्या सर्व उमेदवारांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. सत्तेत येणाऱ्या नव्या नगरसेवकांनी केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता, नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे आणि विकासकामांना गती द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वत्र अपेक्षित यश मिळाले नाही, ही बाब अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे मान्य केली आहे. मात्र, या अपयशाकडे ते निराशेच्या दृष्टीने न पाहता, नव्या जबाबदारीच्या रूपात पाहत असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. जिथे जनतेचा अपेक्षित कौल मिळाला नाही, तिथे जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी अधिक प्रामाणिकपणे, अधिक जबाबदारीने आणि दुप्पट जोमानं काम करत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ही भूमिका राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडवणारी मानली जात आहे. अजित पवार यांनी केवळ आपल्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर निवडणुकीत यशस्वी ठरलेल्या सर्व पक्षांच्या उमेदवारांनाही एक प्रकारचे मार्गदर्शन केले आहे. विजयी उमेदवारांनी आपल्या महानगरपालिकांमध्ये जनतेच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, विकासकामे आणि लोककल्याणाच्या योजनांना गती द्यावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. सत्ता ही सेवा करण्याची संधी असते, हा अप्रत्यक्ष संदेश त्यांच्या वक्तव्यातून देण्यात आला आहे. त्याचबरोबर, जे उमेदवार या निवडणुकीत विजयी होऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठीही अजित पवार यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. पराभवामुळे निराश न होता, जनतेसाठी कार्यरत राहावे आणि जनहित हेच केंद्रस्थानी ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. निवडणूक जिंकली किंवा हरली तरी लोकांसाठी अखंड काम करत राहणे हेच खरे ध्येय असले पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. या भूमिकेमुळे पक्षातील कार्यकर्त्यांना नवी उर्जा आणि पुढील संघर्षासाठी दिशा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ताकदीने काम करण्याचा निर्धार एकूणच, महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर अजित पवार यांनी मांडलेली भूमिका ही आक्रमक राजकारणापेक्षा समतोल, संयम आणि लोकशाही मूल्यांवर आधारित असल्याचे दिसून येते. जनतेचा कौल मान्य करून पुढील काळात अधिक ताकदीने काम करण्याचा निर्धार त्यांनी स्पष्ट केल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील रणनीती ही आत्मपरीक्षण, संघटन मजबूत करणे आणि जनतेचा विश्वास परत मिळवण्यावर केंद्रित असेल, हे त्यांच्या या पोस्टमधून अधोरेखित झाले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाम शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. मराठी माणसाने विकास, प्रगती आणि कामगिरीला प्राधान्य देत भाजपला कौल दिला असून भाषा-प्रांताच्या नावावर भेदभावाचं राजकारण करणाऱ्यांना हा स्पष्ट इशारा आहे, अशा शब्दांत त्यांनी या निकालामागील जनतेचा संदेश अधोरेखित केला आहे. देवेंद्र फडणवीसांची मुलगी दिविजा यांनीही वडीलांना मिठी मारुन आनंद व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत ऐतिहासिक यश संपादन केलं आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता स्थापन होत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात हा मोठा राजकीय टप्पा गाठण्यात आला आहे. या निकालामुळे मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर विराजमान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अनेक दशकांपासून काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या ताब्यात राहिलेल्या बीएमसीत भाजपने अखेर सत्ता मिळवत आपली ताकद सिद्ध केली आहे. या विजयाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भाजप समर्थकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. मुंबईतील मतदारांनी विकास, पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील स्थैर्य या मुद्द्यांना प्राधान्य देत भाजपच्या बाजूने कौल दिल्याचं या निकालातून दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या विविध विकासकामांचा प्रभाव थेट मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर पडल्याचं राजकीय विश्लेषक मानत आहेत. भाजपच्या या विजयामुळे राज्यात सत्ताधारी पक्षाची पकड अधिक मजबूत झाल्याचंही चित्र आहे. या ऐतिहासिक विजयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी खास प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला. त्यांनी विजयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं औक्षण करत कुटुंबीय आनंद साजरा केल्याचं पाहायला मिळालं. राजकीय यश केवळ आकड्यांपुरतं मर्यादित नसून, त्यामागे असलेली मेहनत आणि लोकांचा विश्वास याचं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून अधोरेखित केलं. एका पत्नीच्या भूमिकेतून त्यांनी व्यक्त केलेला हा आनंद आणि अभिमान भाजप समर्थकांसाठी भावनिक क्षण ठरला. अमृता फडणवीस यांनी आपल्या शब्दांतून केवळ अभिनंदनच केलं नाही, तर विरोधकांवर सूचक शब्दांत टीकाही केली. आज मराठी माणसाने विकासकामांना महत्त्व देणाऱ्या, प्रगती साधणाऱ्या पक्षाला भरभरून मतदान करून आपली पसंती दिली आहे, असं म्हणत त्यांनी या विजयामागील जनतेची भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर, मराठी माणसावरून, भाषा आणि प्रांतावरून निरर्थक भेदभावाचं राजकारण करणाऱ्यांना हा एक सूचक संदेश आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या राजकारणावर थेट बोट ठेवलं. या शब्दांतून मुंबईच्या मतदारांनी कोणत्या प्रकारचं राजकारण नाकारलं आहे, हेही त्यांनी अधोरेखित केलं. मुंबई महानगरपालिकेतील हा निकाल केवळ एका निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, पुढील राजकीय दिशा ठरवणारा ठरू शकतो. विकासाच्या मुद्द्यावर केंद्रित राजकारणाला जनतेकडून पाठिंबा मिळतो आहे, तर ओळख, भाषा आणि प्रांत यांवर आधारित राजकारणाला मतदारांनी नकार दिल्याचं या निकालातून स्पष्ट होत आहे. भाजपच्या स्पष्ट बहुमतामुळे मुंबईतील निर्णयप्रक्रिया अधिक वेगाने होईल, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त केला जात आहे. शहराच्या पायाभूत सुविधांपासून ते वाहतूक, स्वच्छता आणि डिजिटल प्रशासनापर्यंत मोठे निर्णय आता सहज शक्य होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला आनंद एकूणच, मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील भाजपचा हा विजय ऐतिहासिक मानला जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाला मिळालेली ही मोठी राजकीय पावती ठरत आहे. अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलेला आनंद आणि त्यांनी दिलेला संदेश हे या विजयाचं भावनिक आणि राजकीय दोन्ही अंग अधोरेखित करतात. मुंबईकरांनी विकासाला दिलेला कौल आणि भाजपवर दाखवलेला विश्वास आगामी काळात शहराच्या कारभाराला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमृता फडणवीस यांची पोस्ट देखील पहा 'आज मराठी माणसाने विकासकामांना महत्व देणाऱ्या, प्रगती साधणाऱ्या पक्षाला भरभरून मतदान करीत आपली पसंती दिली आहे आणि मराठी माणसावरून, भाषा, प्रांतावरून निरर्थक भेदभावाचे राजकारण करणाऱ्यांना सूचक संदेश दिलेला आहे. अभिनंदन देवेंद्र फडणवीस' अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर पराभवाचे सावट आहे. भाजपचे नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी 'उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्री राम' अशा मोजक्या शब्दांत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. त्यांचा यासंबंधीचा उपरोधिकि हास्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. राज्यात गुरुवारी मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी पार पडली. त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत भाजपने मुंबईसह बहुतांश मनपांवर आघाडी घेत विरोधकांचा धु्व्वा उडवला आहे. लातूर, चंद्रपूर आदी निवडक ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली आहे. विशेषतः मुंबईत विजयाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ठाकरे बंधूंची पडझड झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, 227 सदस्यीय मुंबई महापालिकेत भाजप व महायुतीने स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. तर ठाकरे बंधूंचा वारू 70 जागांच्या आसपास उधळत आहे. नीतेश राणेंनी हसण्याचा व्हिडिओ केला पोस्ट या पार्श्वभूमीवर नीतेश राणे एक व्हिडिओ पोस्ट करत ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. नीतेश राणे आपल्या व्हिडिओत उपरोधिकपणे हसताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अगदी मोजक्या शब्दांत उद्धव ठाकरे व त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्रीराम, असे ते म्हणालेत. त्यानंतर पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी ठाकरेंवर टीका केली. निवडणुकीतून जिहादींना कडक संदेश मिळाला ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना माझा हसरा चेहरा पाठवा. उद्धव, आदित्य ठाकरे व त्यांच्या सगळ्यांना माझा जय श्रीराम. आज आमचा भगवा झंजावात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दिसून आला. राज्यातील बहुतांश महापालिकांत जय श्रीरामचा महापौर बसवण्याची तयारी झाली आहे. मी मतदारांचे आभार मानतो. त्यांनी या सगळ्या महापालिकांवर जय श्रीराम व आय लव्ह महादेव यांच्या विचारांचे महापौर बसवले. यामुळे महाराष्ट्र व देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या जिहादींना कडक संदेश मिळाला आहे. ठाकरे बंधूंनी इस्लामाबादचे विमान पकडण्याचा सल्ला नीतेश राणे यांनी यावेळी ठाकरे बंधूंना पाकिस्तानात जाऊन अल्लाह हू अकबर म्हणण्याचाही खोचक सल्ला दिला. मुंबईतील पराभवानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र बसावे. संध्याकाळी इस्लामाबादची फ्लाईट आहे. त्यांनी फ्लाईटमध्ये बसून पाकिस्तानला जावे. तिथे अल्लाह हू अकबर म्हणावे, असे ते म्हणाले. दुसरीकडे, सुषमा अंधारे यांनी नीतेश राणे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. तुझी चूक नाही टिल्लू. बाप आयुष्यभर घोटाळे करण्यात आणि पदासाठी कधी ठाकरे, कधी सोनिया गांधी, फडणवीस यांच्या चरणी लीन होण्यात आयुष्य खर्ची घालत असेल तर पोरगं लायकी दाखवणारच, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, नीतेश राणे यांच्या या टीकेमुळे ठाकरे व भाजपतील वाद एका नव्या टोकाला पोहोचण्याची शक्यता आहे.
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती आघाडीवर आहे, तर काही ठिकाणी कॉंग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूरमध्ये कॉंग्रेस आघाडीवर असून जवळपास विजय निश्चित असल्याचे बोलले जात असून कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जल्लोष केला आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर महानगरपालिकेचे संपूर्ण वाटोळे केले होते, त्याचा बदला जनतेने घेतला आणि कॉंग्रेस व मित्र पक्षांना जनतेने जो पाठिंबा दिला त्याचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. चंद्रपूरवासीयांना धन्यवाद की आपण पुन्हा एकदा कॉंग्रेसवर विश्वास ठेवला आणि घवघवीत यश दिले याचे आभार व्यक्त करतो, अशा भावना वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या आहेत. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, आमची नॅचरल युती होती पप्पू देशमुख यांच्यासोबत. पप्पू देशमुख यांना धरून आमच्याकडे 3 आहेत. काही नगरसेवक ज्यांना पक्षाने तिकीट दिले नव्हते ते अपक्ष लढले, ते दोन नगरसेवक आमच्या बरोबर आहेत. आम्ही आता 32 नगरसेवक आहोत. उद्धव ठाकरे पक्षाचे 6 आहेत. इतर ही संपर्कात आहेत. 40 ते 42 पर्यंत आकडा जाईल. बहुमत मिळेल. सत्ता स्थापन करण्यात अडचण येणार नाही. आमचे 16 आमदार आहेत. पण चंद्रपूर, लातूर, भिवंडी, अमरावती, अकोला येथे आम्ही चांगले यश मिळवले आहे. सत्ता, यंत्रणा, पैसे, मतदार यादीतील घोळ याविरोधात आम्ही लढलो. जनतेने या विरोधात कौल दिला आहे. आम्हाला जनतेने पाठिंबा दिला काँग्रेसला चांगले यश मिळाले पुढच्या वाटचालीसाठी आम्हाला पाठबळ मिळाले, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपूरमध्ये कोणाला किती जागा? चंद्रपूर महापालिकेत एकूण 66 जागा आहेत. यात आत्तापर्यंत कॉंग्रेस + 30, भाजप + 24, शिवसेना ठाकरे गट + 06, राष्ट्रवादी + 02 तर इतरांना 04 जागा मिळाल्या आहेत. विजय वडेट्टीवारांचा डान्स करत जल्लोष
मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर होऊ शकतो. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या निकालात भाजप आघाडीला एकूण 227 जागांपैकी 118 जागांवर आघाडी मिळाली आहे. यामध्ये भाजप 90, शिवसेना शिंदे गट 28 जागांवर पुढे आहे. स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेस आणि शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. 1947 ते 1967 पर्यंत म्हणजे 20 वर्षे काँग्रेसचा महापौर होता. तर 1992 ते 2022 म्हणजे 30 वर्षे महापौरपदावर शिवसेनेचे वर्चस्व होते. भाजपने 45 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईत आपला महापौर बनवण्याच्या स्थितीत पोहोचली आहे. खरं तर, 1980 मध्ये पक्षाची स्थापना झाल्यानंतर भाजपने 1992 ते 2017 पर्यंत मुंबईत शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मुंबईच्या महापौरपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शेवटच्या व्यक्ती शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर होत्या, ज्यांनी 22 नोव्हेंबर 2019 ते 8 मार्च 2022 पर्यंत हे पद सांभाळले होते. त्यावेळी शिवसेनेत फूट पडली नव्हती. त्यानंतर हे पद रिक्त होते. तेव्हापासून, BMC च्या प्रशासनाची जबाबदारी नगर आयुक्त सांभाळत आहेत. महापौरांची निवडणूक कशी होते कोणत्या प्रवर्गातून महापौर, लॉटरी पद्धतीने निर्णय ज्येष्ठ पत्रकार संदीप सोनवलकर यांनी सांगितले की, मुंबईच्या BMC मध्ये महापौर कोणत्या प्रवर्गाचा असेल हे लॉटरी पद्धतीने निश्चित केले जाईल. उदा. ही जागा महिला, ओबीसी किंवा एससी असेल की खुली राहील, याचा निर्णय निवडणूक आयोग लॉटरी पद्धतीद्वारे करेल. महापौरांकडे कोणते अधिकार असतात बीएमसीमध्ये महापौर आणि आयुक्त ही दोन सर्वात मोठी पदे असतात. महापौर महानगरपालिकेच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवतात. शहराचे औपचारिक प्रतिनिधित्व करतात. प्रस्ताव आणि चर्चांवर विचारविनिमय करतात. म्हणजे महापौरांचे काम बहुतेक औपचारिक आणि प्रतिनिधित्वापुरते मर्यादित असते. तर खरी प्रशासकीय आणि कार्यकारी जबाबदारी आयुक्तांकडे असते. आयुक्त शहराचा दैनंदिन कारभार चालवतात. अर्थसंकल्प, शहरातील पायाभूत सुविधा प्रकल्प आणि कर्मचाऱ्यांवर त्यांचे नियंत्रण असते. आयुक्त सामान्यतः आयएएस अधिकारी असतात. BMC निवडणूक का आहे खास 74,000 कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या आशियातील सर्वात मोठ्या सिव्हिक बॉडी BMC वर अविभाजित शिवसेनेने (1997-2017) पर्यंत राज्य केले होते. तेव्हा भाजप तिचा सहयोगी पक्ष होता. मुंबई महानगरपालिकेचे बजेट गोवा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुराच्या बजेटपेक्षाही मोठे आहे. ------------------ ही बातमी देखील वाचा… संभाजीनगरमध्ये भाजपच ठरला मोठा भाऊ, युती तोडणाऱ्या शिवसेनेला जबर फटका:इम्तियाज जलील यांचा प्रयोग यशस्वी; अंबादास दानवेंना मोठा धक्का लातूरने काँग्रेसची प्रतिष्ठा वाचवली:रवींद्र चव्हाण यांचे विलासरावांवरील विधान भाजपला भोवले, देशमुख बंधू ठरले विजयाचे शिल्पकार कोल्हापुरात सतेज पाटलांचा दबदबा, काँग्रेस मोठा पक्ष, सत्ता मात्र दूर:शरद पवारांची पाटी पूर्णपणे कोरी; महायुतीचा काठावरचा विजय
माजी उपमहापौर दीपक मानकर यांचे चिरंजीव राघवेंद्र मानकर आणि हर्षवर्धन मानकर यांनी पुणे महापालिका निवडणुकीत यश मिळवले आहे. दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवून विजय मिळवल्याने पुणे शहराच्या राजकारणात मानकर कुटुंबाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पुणे शहर भाजपचे सरचिटणीस असलेले राघवेंद्र बापू मानकर यांनी प्रभाग क्रमांक २५ मधून निवडणूक लढवली. त्यांनी तब्बल २८ हजार ७०६ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. राघवेंद्र मानकर यांनी प्रचारादरम्यान विकासकामे, नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी यावर भर दिला होता. मागील पाच वर्षापासून मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष बांधणी करून संघटनात्मक कामावर त्यांनी भर दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या सोबत होती. त्यांच्यासोबत भाजपच्या स्वरदा बापट कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित विजयी झाले आहे. दुसरीकडे, हर्षवर्धन मानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक ११ मधून निवडणूक लढवली. त्यांनी स्थानिक प्रश्न, सामाजिक बांधिलकी, आरोग्य, शिक्षण आणि गरीब घटकांसाठीच्या योजनांचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. या मुद्द्यांवर मतदारांचा विश्वास संपादन करत त्यांनी विजय मिळवला. मानकर कुटुंबाचा पुणे शहराच्या राजकारणात दीर्घ अनुभव आहे. दीपक मानकर यांनी उपमहापौर आणि शहराध्यक्ष म्हणून केलेले कार्य आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या राजकीय वारशाला पुढे नेत राघवेंद्र आणि हर्षवर्धन यांनी आपापल्या पक्षांतून यश मिळवले आहे. या विजयामुळे पुणे शहरातील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असून मानकर बंधूंची भूमिका आगामी काळात महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३७ (धनकवडी–कात्रज डेअरी) येथील निकालाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण केली आहे. या प्रभागात भाजपने सर्व चारही जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. विशेष म्हणजे, शिवसेना नेते आणि माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांचा या निवडणुकीत पराभव झाला असून, हा निकाल शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रभाग क्रमांक ३७ मधून भाजपचे उमेदवार किशोर धनकवडे यांनी सर्वाधिक २६,९४१ मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला. त्यांच्यासोबत वर्षा तापकीर (२३,४४४ मते), अरुण राजवाडे (१५,०३३ मते) आणि तेजश्री बदक (१४,२६१ मते) यांनीही विजय मिळवला. या निकालामुळे भाजपचा संपूर्ण पॅनल या प्रभागात विजयी ठरला आहे. दुसरीकडे, शिवसेनेकडून निवडणूक लढवणारे आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांना केवळ १०,६६१ मते मिळाली आणि त्यांचा पराभव झाला. गिरीराज सावंत यांच्या पराभवामुळे स्थानिक राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रभागात भाजपने विकासकामे, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरी प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत प्रचार केला होता. मतदारांनी याला भरघोस प्रतिसाद दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. संघटित प्रचार, स्थानिक कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि केंद्र व राज्यातील सत्तेचा प्रभाव भाजपच्या विजयामागे प्रमुख कारणे ठरल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. एकूणच, प्रभाग क्रमांक ३७ मध्ये भाजपने 'क्लीन स्वीप' करत आपले राजकीय बळ दाखवून दिले आहे. या निकालानंतर शिवसेनेला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
पुण्यात भाजपच्या सई थोपटे सर्वात तरुण नगरसेविका:22 व्या वर्षी पुणे महापालिकेत मिळवला विजय
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या 22 वर्षीय सई थोपटे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे सई थोपटे पुणे महापालिकेच्या इतिहासातील सर्वात तरुण नगरसेविका ठरल्या आहेत. त्यांच्या या यशाचे शहरात कौतुक होत आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येत असल्या तरी, सई थोपटे यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत अत्यंत संयमी आणि प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली. कमी वयात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे त्यांच्या क्षमतेबद्दल अनेक चर्चा होत्या, मात्र निकालाने सर्व शंका दूर केल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत विजय संपादन केला. सई थोपटे यांनी प्रभागातील रस्ते, पाणी आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत प्रश्नांसोबतच तरुणांच्या रोजगारासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी काम करण्याचे आश्वासन दिले होते. 'उच्चशिक्षित आणि तरुण प्रतिनिधी समस्या अधिक चांगल्या प्रकारे मांडू शकतो,' या विश्वासातून मतदारांनी त्यांना पसंती दिली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच विविध कार्यक्रमात आणि आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला त्यामुळे त्या चर्चेत आल्या. विजयानंतर बोलताना सई थोपटे म्हणाल्या, हा विजय माझा नसून माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या प्रत्येक मतदाराचा आहे. सई थोपटे यांच्या विजयामुळे पुणे महापालिकेत आता तरुण लोकप्रतिनिधींचा आवाज ऐकायला मिळणार आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर थेट जनसेवेच्या रिंगणात उतरलेल्या सई यांच्याकडे भाजपचे एक उगवते नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या या यशामुळे सोशल मीडियावरही त्यांचे अभिनंदन होत असून, 'युथ आयकॉन' म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
पिंपळदरीची सून झाली केडीएसीची नगरसेवक:काँग्रेस पक्षाकडून मिळाली होती उमेदवारी, पिंपळदरीत जल्लोष
औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी गावाची सून समीना शेख इरफान यांचा कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीत विजयी झाल्या असून त्यांच्या विजयाचा शुक्रवारी ता. १६ पिंपळदरीत जल्लोष करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांनी फटाके फोडून पेढेही वाटप केले. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील रहिवासी असलेले शेख नजीर हे सन १९९८ मध्ये कामाच्या शोधात मुंबई येथे गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी रेती बंदर येथे काम करण्यात सुरवात केली. त्यानंतर ते त्याच ठिकाणी ट्रक चालकही झाले. यातून बऱ्यापैकी पैसे मिळत असल्याने शेख नजीर हे त्याच ठिकाणी स्थायीक झाले. मात्र दरवर्षी ते मुळ गावी पिंपळदरी येथे येतात. शेख नजीर व त्यांच्या कुटुंबिय तेथे राहणाऱ्या सर्वांच्याच सुख, दुःखात सहभागी होतात. या शिवाय शेख नजीर व त्यांचा मुलगा शेख इरफान यांनी जनसंपर्कही वाढविला आहे. गरजूंना मदत करण्यासाठी दोघेही नेहमीच पुढाकार घेतात. दरम्यान, शेख कुटुंबाचा जनसंपर्क पाहून काँग्रेस पक्षाने शेख नजीर यांची सून समीना इरफान शेख यांना कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीत रेती बंदर प्रभाग क्रमांक आठ मधून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत शेख कुटुंबियांनी जोरदार प्रचार केला. घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या शिवाय पक्षाच्या नेत्यांनीही वेळोवेळी त्यांना मदत केली. दरम्यान, आजच्या मतमोजणीकडे कल्याण डोंबिवलीच्या नागरीकांसोबतच पिंपळदरीच्या गावकऱ्यांचेही लक्ष लागले होते. दुपारच्या वेळी प्रभाग क्रमांक आठचा निकाल जाहिर झाला. पिंपळदरीची सून असलेल्या समीना इरफान शेख ह्या विजयी झाल्याचे जाहिर करण्यात आले. त्यांच्या विजयाची बातमी कळताच पिंपळदरीकरांनी गावात फटाके फोडले तसेच पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे, शेख गफार, संभाजी डुकरे, भगवान रिठ्ठे, शेख रसूल, शेख बुऱ्हाण, शेख खाजा, शेख बद्रोद्दीन, शेख तय्यब, शेख बाबु, संजय घोंगडे, कौशल्याबाई बेले, शुध्दमती घोंगडे, नारायण रिठ्ठे, शेख छोटू, शफीक शेख, मथुराबाई डुकरे, कोंडाबाई डुकरे यांची उपस्थिती होती.
काँग्रेसचे ५ शहरांत महापौर तर ३५० नगरसेवक
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश समाधानकारक नसले तरी यश अपयशाची पर्वा न करता आम्ही वैचारिक लढाई लढलो. जनतेचा विश्वास व कार्यकर्त्यांचा निर्धाराचा लढा या जोरावर काँग्रेस पक्ष राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसत आहे. पाच शहरांत काँग्रेसचा महापौर तर ३५० नगरसेवक आणि १० ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ असे चित्र आहे, असे […] The post काँग्रेसचे ५ शहरांत महापौर तर ३५० नगरसेवक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. मुंबईत भाजप आणि शिवसेना युती आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे देखील बऱ्यापैकी जागा येताना दिसत आहेत. एकूणच येथील निवडणूक ही अटीतटीची दिसून येत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, दुपारी 3 नंतर जे निकाल यायला सुरुवात झाली त्यातले 80-85 टक्के निकाल हे शिवसेनेच्या विजयाच्या आहेत. आम्ही अनेक ठिकाणी आघाडीवर आहोत. नक्कीच अटीतटीची लढत आहे. काटे की टक्कर आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुद्धा उमेदवार विजयी होत आहेत. त्यांचाही आकडा वाढत आहे. अशा वेळेला तुम्ही आव्हाणांची भाषा करत आहात. मुंबईची लढाई इतर महापालिकांपेक्षा वेगळी आहे, इथली लढाई आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. अजून लढाई संपली नाही. पूर्ण निकाल हाती आल्यानंतर मग आपण बोलू. शिवसेना फुटली नसती तर 120-15 जागांवर जिंकली असती पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेना फोडून हा विजय ते मिळवत आहेत. शिवसेना फुटली नसती तर 120-15 जागांवर जिंकली असती आणि भाजपचा खेळ 50-60 मध्ये संपला असता. मराठी माणूस हा आजही ठाकरेंच्याच मागे आहे. मुंबईवर महापौर बसवण्यासाठी शिवसेना फोडली. महाराष्ट्राचे मराठी माणसाच्या एकजुटीला सुरुंग लावला. पण मराठी माणूस हा ठाकरेंच्याच पाठीशी आहे, हे तुम्हाला निकालानंतर दिसेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. त्यांच्या विजायला आम्ही निर्भीड विजय मानत नाही एमआयएमचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत, यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, एमआयएमला भाजपने ताकद दिली. काही मुस्लिमांची मते आमच्याकडे वळणार असते, तर ते वळू नयेत म्हणून यांनी पायघड्या घातल्या. तसेच पुणे सारख्या ठिकाणी सुद्धा भाजप आघाडीवर आहे, यावर बोलताना राऊत म्हणाले, भाजपच्या हातात जर फ्रांसचा जरी निवडणूक आयोग असता, तर हे तिकडे पण जिंकले असते. त्यांचा सगळा जोर यंत्रणा हायजॅक करण्यावर आहे. त्यांच्या विजायला आम्ही निर्भीड विजय मानत नाही. निवडणूक आयोग नेमताना विरोधी पक्षाला विश्वासात घ्यावे, पण केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे अशा प्रकारचे लोकशाहीला रुचेल पचेल असे कोणतेही सत्कार्य करणार नाही, असे राऊत म्हणाले. ज्याच्या हातात निवडणूक आयोग असतो, ताटाखालचे मांजर झालेले असते अन ज्याच्या हातात यंत्रणा विकत घ्यायची ताकद असते ते कोणताही विजय मिळवू शकतात, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
राज्यातील २२ मनपात मनसेला भोपळा
मुंबई : आज महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, बहुतांश ठिकाणी भाजपने बहूमत मिळवले आहे. यात मुंबई मनपाची देशभरात चर्चा सुरू होती. या निवडणुकीच्या निमित्ताने दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यामुळेच, उद्धवसेना आणि मनसे किती जागा जिंकणार, याकडेच सर्व राज्याचे लक्ष लागून होते. मुंबई मनपात प्रथमच भाजपला बहुमत मिळण्याची […] The post राज्यातील २२ मनपात मनसेला भोपळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. 60 टक्के मतदान झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल स्पष्टपणे भाजपच्या बाजूने झुकलेला दिसून आला आहे. शिवसेनेसोबत युती न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपसाठी फायदेशीर ठरला, तर हाच निर्णय शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी अंगलट आला आहे. निकालांचे चित्र स्पष्ट होत असताना भाजप सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली असून महापालिकेत शतप्रतिशत सत्तेपर्यंत मजल मारली आहे. याउलट, ‘आम्हीच मोठा भाऊ’ असा दावा करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला आता लहान भावाच्या भूमिकेत राहावे लागणार आहे. या निवडणुकीत विशेष बाब म्हणजे भाजप, शिंदे गटाची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट), एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी-सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. कोणतीही औपचारिक युती नसताना देखील भाजपने सर्वाधिक स्ट्राइक रेट राखला. बंडखोरी, अंतर्गत नाराजी आणि तिकीट वाटपावरील असंतोष असूनही भाजपने मतदारांचा विश्वास मिळवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॉक शो आणि प्रचारसभांमधून विकासकामांचा लेखाजोखा मांडत ‘भगव्याची शान राखा’ असं थेट आवाहन केलं होतं, त्याला संभाजीनगरच्या मतदारांनी प्रतिसाद दिल्याचं निकालातून दिसून आलं. नेत्यांच्या मुलांना आणि नातेवाईकांना तिकीट दिल्याने पक्षांतर्गत नाराजी याउलट, शिंदे गटाच्या शिवसेनेला स्वबळाचा निर्णय महागात पडला. उमेदवार निवडीत मोठ्या प्रमाणावर नेत्यांच्या मुलांना आणि नातेवाईकांना तिकीट देण्यात आल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढली. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदा यांना उमेदवारी दिली होती. वर्षानुवर्षे नगरसेवक, माजी महापौर राहिलेल्यांना पुन्हा संधी देताना नव्या आणि इतर पक्षांतून आलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. परिणामी, संजय शिरसाट स्वतः आपल्या मुलगा-मुलीच्या प्रभागांमध्येच अडकून पडले आणि संपूर्ण शहरात पक्षाला अपेक्षित ताकद लावता आली नाही. याचा थेट परिणाम शिवसेनेच्या जागांवर झाला असून भाजपच्या तुलनेत सेनेची पिछेहाट स्पष्ट दिसते. इम्तियाज जलील यांचा प्रयोग यशस्वी दरम्यान, एमआयएमने अंतर्गत वाद, उमेदवारी वाटपातील आरोप आणि इम्तियाज जलील यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरही आपली पारंपरिक वोटबँक मोठ्या प्रमाणात टिकवून ठेवली आहे. बावीस माजी नगरसेवकांची तिकीटं कापण्याचा निर्णय पक्षासाठी काही तोट्याचा ठरला नाही. एमआयएमला केवळ एका जागेचा फटका बसताना दिसतो आहे. मागील महापालिकेत 25 नगरसेवकांसह विरोधी पक्षात बसलेली एमआयएम यावेळीही जवळपास त्याच भूमिकेत राहणार आहे. मोठ्या प्रमाणावर नाराजी असतानाही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा इम्तियाज जलील यांचा प्रयोग यशस्वी ठरल्याचे राजकीय निरीक्षक मानतात. यात पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी गल्लीबोळात फिरून केलेला प्रचारही निर्णायक ठरला. संपूर्ण निवडणूक व्यवस्थापन अंबादास दानवे यांच्याकडे केंद्रित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी मात्र ही निवडणूक फारशी समाधानकारक ठरलेली नाही. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच नव्वदहून अधिक जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करणाऱ्या या पक्षाची ‘मशाल’ अपेक्षेप्रमाणे पेटली नाही. माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांना पक्षात घेऊन मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न फसला. उलट, या निर्णयामुळे चंद्रकांत खैरे नाराज झाले. उमेदवार निवड आणि संपूर्ण निवडणूक व्यवस्थापन अंबादास दानवे यांच्याकडे केंद्रित राहिल्याने खैरे यांनी प्रचारात फारसा रस घेतला नाही. परिणामी, एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा लढवूनही केवळ 6 उमेदवारांपुरताच पक्षाचा निकाल मर्यादित राहिला. मतदारांचा कल स्पष्टपणे महायुतीकडे झुकलेला काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी नाराज कार्यकर्त्यांसाठी आपली दारं खुली ठेवली होती, मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. या पक्षांना एक अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं. आकडेवारी पाहता संभाजीनगरच्या मतदारांचा कल हा स्पष्टपणे राज्यातील सत्ताधारी महायुतीकडे झुकलेला दिसतो. शहराचा विकास साधायचा असेल तर केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या पक्षासोबतच जायला हवं, हा ट्रेंड याआधी नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांत दिसून आला होता आणि तोच ट्रेंड आता महापालिकेतही कायम राहिल्याचं चित्र आहे.
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती आघाडीवर आहे, तर काही ठिकाणी कॉंग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत ठाकरे बंधूंच्या जोरावर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची देखील चांगली कामगिरी दिसून येत असली तरी भाजप आणि महायुती आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्याच निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपच्या कार्यालयात जाऊन निवडून आलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंद केले. यावेळी एकच जल्लोष पाहायला मिळाला. सुरुवातील बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, आज खरेतर आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने जे स्वप्न पाहिले होते की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत यशाच्या दिशेने पक्ष नेण्याच्या दृष्टिकोनातून गेली अनेक वर्ष हा बूथ लेव्हलवर ताकदीने प्रयत्न करत असताना दिसून येतो. असे अनेक कार्यकर्ते आहेत त्यांना निवडणुकीत संधी मिळाली नाही, त्याग आणि समर्पणाची भूमिका त्यांनी पार पाडली. देशाचे पंतप्रधान मोदीजी, अमित भाई असतील आणि सर्व नेतेगण आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला एक दिशा देण्याचे काम केले आहे. संपूर्ण निवडणूक ही विकासाच्या दिशेने नेण्याचे काम केले, असे मत चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले. बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आपल्याच पाठीशी- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीची सत्ता येत आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबईच्या महापालिकेतही जी काही वाटचाल सुरू आहे, त्यानुसार पूर्ण बहुमत महायुतीलाच मिळणार आहे. जसे आता अध्यक्षांनी सांगितले की आपण या निवडणुकीत विकासाचा अजेंडा घेऊन गेलो. याच विकासाच्या अजेंडाला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे. लोकांना विकास हवा आहे म्हणून त्यांनी आपल्याला निवडून दिले आहे. तसेच या निकालाने आणखी एक गोष्ट स्पष्ट केली आहे, जनतेचा विश्वास हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचेही मी स्मरण करतो, कारण त्यांचा आशीर्वाद हा आपल्याच पाठीशी होता, असेही फडणवीस म्हणाले. हिंदुत्व आणि विकास यांना वेगळे करता येणार नाही पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचा अजेंडा हा विकासच असणार आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे सगळे करत असताना ही गोष्ट सांगितली पाहिजे, आमचा जो कार्याचा आत्मा आहे, जो विचारांचा आत्मा आहे, हा हिंदुत्ववादीच आहे. हिंदुत्व आणि विकास यांना वेगळे करता येणार नाही. आमचा हा जो आत्मा आहे, यानेच आम्हाला जनतेपर्यंत पोहोचवले. जो जो या देशाच्या संस्कृतीला आपली संस्कृती मानतो, अशा सगळ्या लोकांना आम्ही हिंदू मानतो. मी एवढेच सांगू इच्छितो की, एवढे मोठे समर्थन जेव्हा मिळते, तेव्हा जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्याला जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे. उन्माद नसावा. त्याचसोबत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना हेच सांगायचे आहे की आपण सर्वांनी या गोष्टीची जाण आपण ठेवली पाहिजे. लोकांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी निवडून आलेल्या कार्यकर्त्यांना दिला.
पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवारांचा विजय
पुणे : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी काल(गुरूवारी, ता १५) रोजी मतदान पार पडले, त्याचा निकाल शुक्रवार १६ जानेवारी रोजी जाहीर झाला आहे, अनेक कारणांनी महानगरपालिका निवडणूक चर्चेत आली, त्यातीलच एक कारण म्हणजे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाकडून आयुष कोमकर हत्याप्रकरणात तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. प्रभाग क्रमांक […] The post पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवारांचा विजय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना काँग्रेससाठी दिलासादायक बातमी लातूरमधून समोर आली आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी काँग्रेसला धक्के बसत असताना लातूर महानगरपालिकेने काँग्रेसची राजकीय लाज वाचवली असल्याचं चित्र आहे. 70 जागांच्या लातूर महानगरपालिकेत काँग्रेसने स्वबळावर 47 जागा जिंकत स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. याउलट भाजपला 22 मिळाल्या आहेत. तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं. लातूर हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो आणि या निवडणुकीत तो पुन्हा एकदा अधोरेखित झाला. विशेष म्हणजे ही दुसरी महानगरपालिका ठरली आहे जिथे काँग्रेसने भाजपला थेट पराभूत केलं आहे. यापूर्वी चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसने विजय मिळवत भाजपसमोर कडवं आव्हान उभं केलं होतं. लातूर आणि चंद्रपूर वगळता राज्यातील बहुतांश महानगरपालिकांमध्ये काँग्रेसची पिछेहाट झाली असली, तरी या दोन शहरांमुळे पक्षाला नैतिक बळ मिळालं आहे. लातूरमध्ये भाजपच्या पराभवामागे प्रचारादरम्यान झालेला एक वादग्रस्त मुद्दा निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचारादरम्यान लातूर शहरातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी शंभर टक्के पुसून टाकल्या पाहिजेत, असं विधान केलं होतं. हे वक्तव्य स्थानिक पातळीवर प्रचंड संतापाचं कारण ठरलं. विलासराव देशमुख हे लातूरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांच्या स्मृतींबाबत केलेल्या या विधानाचा उलटा परिणाम भाजपला भोगावा लागला. वाद वाढल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी माफी मागितली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या उभारणीत मोठं योगदान दिलं असून आपण त्यांचा सन्मान करतो, असं स्पष्ट केलं. मात्र तोपर्यंत राजकीय नुकसान झालं होतं, असं निरीक्षकांचं मत आहे. या मुद्द्यावरून देशमुख कुटुंबीयांना नवसंजीवनी मिळाल्याचंही बोललं जात आहे. विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी लोकांच्या मनात कोरलेली नावं कधीच पुसली जाऊ शकत नाहीत असं सूचक विधान केलं होतं. लातूरच्या निकालाकडे 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही पाहिलं जात आहे. त्या वेळी भाजप 36 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर काँग्रेसला 33 जागा मिळाल्या होत्या. एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली होती. त्यानंतर अर्धा कार्यकाळ भाजपकडे महापौरपद राहिलं, तर उर्वरित काळात काँग्रेसला संधी मिळाली. मात्र यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट आघाडी घेत भाजपला पिछाडीवर टाकलं आहे, हे चित्र पूर्णपणे वेगळं आहे. लातूरच्या राजकारणात देशमुख कुटुंबाचा प्रभाव आजही कायम आहे. विलासराव देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या तीन पुत्रांपैकी अमित देशमुख हे सध्या लातूर सिटीचे आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत धीरज देशमुख यांना पराभव स्वीकारावा लागला होता, तर अमित देशमुख विजयी झाले होते. लातूर लोकसभा मतदारसंघावरही काँग्रेसचं वर्चस्व असून शिवाजी कलगे हे येथून खासदार आहेत. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम महानगरपालिका निवडणुकीत दिसून आला. लातूरचा विजय काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा एकूणच पाहता, राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निकालांमध्ये काँग्रेससाठी चित्र फारसं अनुकूल नसताना लातूर आणि चंद्रपूर या दोन शहरांनी पक्षाला मोठा दिलासा दिला आहे. नागपुरातही काँग्रेसने 2017 च्या तुलनेत आपली कामगिरी सुधारली असून काही जागांची भर घातली आहे. मात्र मुंबईत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा फटका काँग्रेसला बसला आणि पक्षाच्या जागा निम्म्यावर आल्या. सांगली-मिरज-कुपवडमध्ये काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली, तर चंद्रपूरमध्ये भाजपसोबत चुरशीची लढत देत 30 जागांवर विजय मिळवला. या सगळ्या निकालांमध्ये लातूरचा विजय काँग्रेससाठी प्रतीकात्मक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरतो, असंच चित्र सध्या दिसून येत आहे.
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती आघाडीवर आहे, तर काही ठिकाणी कॉंग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत ठाकरे बंधूंच्या जोरावर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची देखील चांगली कामगिरी दिसून येत आहे. आता लातूरमध्ये कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने बहुमताचा आकडा गाठला असल्याची माहिती समोर आली आहे. लातूरमध्ये कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारली असल्याचे दिसून येत आहे. लातूर महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने बहुमताचा आकडा गाठला आहे. कॉंग्रेस आणि वंचितच्या युतीला लातूरमध्ये 47 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 22 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे लातूर महापालिकेत कॉंग्रेसचा महापौर होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. लातूर महापालिकेत एकूण 18 प्रभाग असून 70 जागा आहेत. यात भाजपला 22 जागा, कॉंग्रेसला 47 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा महापौर बसणार हे निश्चित झाले आहे. लातूरमध्ये कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट यांच्यात मुख्य लढत होती. राज्यातल्या 29 महापालिकांसाठी काल मतदान झाल्यावर आज सर्वत्र मतमोजणी सुरु असून निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहे.
मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल स्पष्टपणे दिसून येत आहेत. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळताना दिसत असल्या तरी, या निकालातील सर्वात ठळक बाब म्हणजे असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमने केलेली अभूतपूर्व मुसंडी. भाजप व पारंपरिक प्रादेशिक पक्षांबरोबरच आता एमआयएम हा महापालिका राजकारणातील एक महत्त्वाचा घटक ठरत असल्याचं या निकालांमधून अधोरेखित झालं आहे. राज्यातील 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमचे एकूण 95 उमेदवार विजयी झाले असून, हा आकडा पक्षासाठी ऐतिहासिक मानला जात आहे. एमआयएमची कामगिरी केवळ मराठवाडा किंवा मुस्लिमबहुल भागांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर या पक्षाने मुंबईसारख्या महानगरातही ठळक उपस्थिती नोंदवली आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईतील काही प्रभागांमध्ये एमआयएमने थेट दिग्गज आणि पारंपरिक राजकीय गटांचे गणित बिघडवले आहे. अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मानखुर्द परिसरात एमआयएमने विजय मिळवत मोठा राजकीय धक्का दिला आहे. मुंबईतील हा निकाल पाहता, एमआयएम आता केवळ पर्यायी पक्ष न राहता थेट स्पर्धक म्हणून पुढे येत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. मुंबई महानगरपालिकेत एमआयएमने सहा जागांवर विजय मिळवला आहे. या विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक 134 मधून मेहजबिन खान, 136 मधून जमीर कुरेशी, 137 मधून समीर पटेल, 138 मधून रोशन शेख, 139 मधून शबाना शेख आणि 145 मधून खैरुनिसा हुसेन यांचा समावेश आहे. या निकालांमुळे मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः समाजवादी पक्षाला मिळालेल्या धक्क्यामुळे अल्पसंख्याक मतदारांच्या राजकीय पसंतीत बदल होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यपातळीवर पाहता, एमआयएमने 29 महापालिकांपैकी 13 महापालिकांमध्ये एकूण 95 जागांवर विजय मिळवला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एमआयएमने 24 जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे, या शहरात उमेदवार निवडीदरम्यान मोठा गदारोळ झाला होता. तरीही त्या सर्व वादांना मागे टाकत एमआयएमने प्रभावी कामगिरी करत आपली ताकद सिद्ध केली आहे. मराठवाड्यातील हा विजय ओवेसींसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मालेगाव महानगरपालिकेत एमआयएमने 20 उमेदवार विजयी करून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. याशिवाय सोलापूर, धुळे आणि नांदेड या तीन महानगरपालिकांमध्ये प्रत्येकी 8 जागांवर एमआयएमच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या तीन शहरांमधून एकूण 24 नगरसेवक निवडून येणं ही पक्षाची संघटनात्मक ताकद दर्शवणारी बाब मानली जात आहे. या निकालांमध्ये समाजवादी पक्षाला मागे टाकत एमआयएमने स्पष्ट सरशी साधली असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. इतर शहरांचाही विचार करता, अमरावतीमध्ये एमआयएमचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत, तर ठाण्यात 5 आणि नागपुरात 4 जागांवर एमआयएमने यश मिळवलं आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतही एमआयएमने पहिल्यांदाच विजयाचं खातं उघडलं असून, हा निकाल पक्षाच्या विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. विविध भौगोलिक भागांमध्ये मिळालेलं हे यश एमआयएमच्या वाढत्या प्रभावाचं स्पष्ट द्योतक मानलं जात आहे. वाद, संघर्ष आणि विरोधाच्या पार्श्वभूमीवरही लक्षणीय यश दरम्यान, या यशामागे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची राज्यभरातील आक्रमक प्रचारशैली महत्त्वाची ठरल्याचं बोललं जात आहे. ओवेसी यांनी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सभा घेत मतदारांशी थेट संवाद साधला होता. अकोल्यातील सभेदरम्यान मोठा गदारोळ झाला होता, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नही झाला होता. या सर्व वाद, संघर्ष आणि विरोधाच्या पार्श्वभूमीवरही एमआयएमने महाराष्ट्रात लक्षणीय यश मिळवलं आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिका राजकारणात एमआयएमची भूमिका अधिक निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिका निवडणुकीचे निकाल आता जाहीर होत असून यात शिवसेना ठाकरे गटाला मुंबई वगळता इतर ठिकाणी फारसे यश मिळत नसल्याचे दिसत आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील दोन्ही शिवसेना बॅकफुटवर पडल्याचे दिसत आहे. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे म्हणाले, भाजपला बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. जनमत इतके विरोधात असताना सुद्धा, भाजपचे कोणतेही वैशिष्ट्यपूर्ण काम नसतानाही भाजपला निवडून दिले, मला वाटते जनमताचा आदर केला पाहिजे. शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये कमी जागा मिळाले आहेत, यासाठी तेच जबाबदार असल्याचे दानवे म्हणाले. शिंदेंचा पक्ष म्हणजे कंपनी, ती विधानसभा आणि लोकसभेला चालली. महापालिकेच्या निवडणुकीला नाही चालली. मुंबईत त्यांच्याकडे गोळा केलेले किती नगरसेवक होते, आता काय परिस्थिती आहे. भाजपने या दोन टोळ्या पाळल्या आहेत, एक शिंदेंची टोळी आणि एक अजितदादांची टोळी, अशी टीका दानवे यांनी केली. एमआयएम पक्षाचे संभाजीनगरमध्ये 33 च्या वर जागा निवडून आले आहेत, तसेच शिवसेना संपवण्याचे काम भाजपने केले असल्याचे जलील म्हणाले होते. यावर अंबादास दानवे म्हणाले, पूर्वी युतीची बोलणी करताना किंवा चर्चा करताना भाजप ही शिवसेनेच्या मागे असायची. शिवसेना जागा द्यायची आधी, आणि आमचे निवडून यायचे. आता उलटे झाले आहे, भाजप पुढे गेली आणि शिवसेना मागे राहिली आहे. चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर टीका केली होती. यावर बोलताना दानवे म्हणाले, यावर मला बोलणे योग्य वाटत नाही. मी इतर उमेदवारांना जेवढा वेळ दिला तेवढाच वेळ माझ्या भावाला दिला होता. इथे 6 जागेवरच आम्ही जिंकलो आहोत. मुंबईच्या निकालावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, 70 च्या वर जागा ज्या काही आल्या आहेत, त्या फक्त ठाकरेंच्या जोरावर आहे. भाजपला केंद्रापासून संगळीकडून मदत होती. त्यामुळे मुंबईत ठाकरेच चालतात, असे दानवे म्हणाले.
पुणे शहरातील प्रभाग क्रमांक २३ च्या निवडणूक निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. तुरुंगातून निवडणूक लढवलेल्या सोनाली वनराज आंदेकर यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा ४५० मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. याच प्रभागात तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्या लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनी देखील विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक २३ ही नेहमीच चुरशीची लढत पाहणारी जागा मानली जाते. प्रतिभा धंगेकर या नावाजलेल्या आणि प्रस्थापित उमेदवार होत्या. त्यांना माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची राजकीय पार्श्वभूमी आणि संघटनात्मक ताकद लाभली होती, त्यामुळे त्या सुरुवातीपासूनच आघाडीवर मानल्या जात होत्या. मात्र, दुसरीकडे सोनाली वनराज आंदेकर यांनी तुरुंगातूनच निवडणूक लढवत जनतेचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या उमेदवारीभोवती सहानुभूतीची लाट निर्माण झाली. “अन्यायाविरुद्ध लढणारी महिला” अशी त्यांची प्रतिमा मतदारांमध्ये रुजली. त्यांच्या समर्थकांनी प्रभागात घरोघरी जाऊन प्रचार केला आणि आंदेकर यांचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवला. मतमोजणीदरम्यान सुरुवातीला चुरशीची लढत पाहायला मिळाली. अंतिम फेऱ्यांमध्ये सोनाली आंदेकर यांनी निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला. त्यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत आनंद साजरा करण्यात आला. या निकालामुळे धंगेकर कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, प्रस्थापित नेतृत्वाला मतदारांनी नाकारल्याची चर्चा सुरू झाली आहे. तुरुंगातून निवडणूक जिंकणाऱ्या सोनाली वनराज आंदेकर यांचा विजय हा केवळ वैयक्तिक नसून, सध्याच्या राजकीय व्यवस्थेविरोधातील जनभावनेचे प्रतीक मानले जात आहे. आगामी काळात या विजयाचे राजकीय पडसाद संपूर्ण पुण्यात उमटण्याची शक्यता आहे.
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची मतमोजणी पार पडत असून बहुतांश भागात भाजप व महायुतीला बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात, अर्थात मुंबईतही भाजपला स्पष्ट बहुमत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीतच या निवडणुकीवर आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इम्तियाज जलील म्हणाल्या, भारतीय जनता पार्टीचे एक लक्ष होते, पूर्ण महाराष्ट्रात त्यांना शिवसेनेला संपवायचे होते. एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना संपवायची होती. म्हणून त्यांनी ऐनवेळी जे अलायन्स ब्रेक केले आणि त्यात ते यशस्वी झाले आहे. आता शिवसेना आमच्या मागे आहे. त्यांचा एक पालकमंत्री, आमदार आणि खासदार असून काय उपटले? असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. शहराच्या विकासासाठी भाजपचे समर्थन करणार पुढे बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, एमआयएमच्या बाबतीत सभेत बोलत होते, एमआयएम जातीवादी पक्ष आहे, आम्ही सगळ्या समाजातल्या लोकांना निवडून आणले आहे. हे सर्वसामान्य लोकांचे यश आहे. शहराचे विकास करण्यासाठी आम्ही नक्कीच भाजपचे समर्थन करणार. पण समांतर सारख्या योजना आणून भाजपचा अजेंडा जर थोपणार असेल तर एमआयएम पूर्ण ताकदीने जे विरोधी पक्षाचा रोल असेल तो निभावणार. इम्तियाज जलील म्हणाले, इतके मोठे यश आत्तापर्यंत एमआयएमला मिळाले नव्हते, जितके आज मिळाले आहे. भिवंडी सारख्या ठिकाणी 4 जागा जिंकलो आहोत, मुंब्रा सारख्या ठिकाणी आम्ही 5 जागा जिंकलो आहोत. धुळ्यात आत्तापर्यंत आम्ही 8 जागा जिंकले आहेत, बहुतेक तिथे आमचे 15 सीट येतील, अमरावतीमध्ये 9 सीट, अकोलामध्ये 3, जालनामध्ये 2, अहमदनगरमध्ये 2, नांदेडमध्ये आत्तापर्यंत 6 सीट जिंकल्या आहेत, तिथे आम्ही 10 पर्यंत पोहोचू शकतो. आम्हाला विश्वास आहे की 100 पेक्षा जास्त एमआयएमचे नगरसेवक या महाराष्ट्रात असणार आहेत.
मराठवाड्यात शिंदेसेना बॅकफुटवर
छत्रपती संभाजीनगर/ नांदेड : छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ नांदेडमध्ये पण भाजपने मोठी मुसंडी मारली. या दोन्ही महानगरपालिकांमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली असल्याचे म्हटले जात आहे. निवडणुकीच्या निकालानंतर जी आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे विरोधकांचा सुपडा साफ झाल्याचे दिसून येत आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे अस्तित्वच पणाला लागल्याचे दिसत आहे. तर ठाकरेंच्या सेनेचा मराठवाड्याचा गड चढतानाच श्वास फुलला. तर […] The post मराठवाड्यात शिंदेसेना बॅकफुटवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात ६५ उमेदवार बिनविरोध बनले नगरसेवक
मुंबई : राज्यातील २९ महापालिकांचे निकाल आता समोर आले आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या प्रमुख महापालिकांमध्ये भाजपा महायुतीने जोरदार विजय मिळवला आहे. मुंबईत गेल्या २५ वर्षांची ठाकरेंची सत्ता पालटत भाजपाने महायुतीने तब्बल १३० जागांपर्यंत मुसंडी मारली आहे. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचा फार मोठा परिणाम दिसून आला नाही. मराठी बहुल भागात उद्धवसेना-मनसेला […] The post राज्यात ६५ उमेदवार बिनविरोध बनले नगरसेवक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे मनपा निवडणूक:बाणेर-बालेवाडी प्रभागाचा निकाल लांबणीवर; वसंत मोरे यांचा पराभव
पुणे महानगरपालिका निवडणुकीचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले असून, शहरातील बहुतांश प्रभागांचे निकाल हाती आले आहेत. मात्र, संपूर्ण पुण्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग क्रमांक ९ (बाणेर-बालेवाडी-पाषाण) मधील निकाल अद्याप गुलदस्त्यातच आहे. या प्रभागातील मतमोजणी अद्याप सुरू न झाल्याने 'कामाचा माणूस' म्हणून ओळखले जाणारे अमोल बालवडकर यांच्या नशिबाचा कौल काय असेल, हे जाणून घेण्यासाठी पुणेकरांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. पुणेकरांचे लक्ष बाणेर-बालेवाडीकडे पुण्यातील राजकीय वर्तुळात यंदा अनेक धक्कादायक वळणे पाहायला मिळाली. त्यातही अमोल बालवडकर यांची जागा ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. निवडणुकीपूर्वी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केलेल्या बालवडकरांच्या या बंडखोरीमुळे या प्रभागातील लढत चौरंगी आणि अटीतटीची झाली आहे. मात्र, प्रशासकीय कारणास्तव किंवा प्रक्रियेतील विलंबामुळे या प्रभागाची मतमोजणी लांबणीवर पडली आहे. सायंकाळपर्यंत निकालाची प्रतीक्षा मिळालेल्या माहितीनुसार, अमोल बालवडकर यांच्या प्रभागातील प्रत्यक्ष मतमोजणीला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या जागेचा अधिकृत निकाल हाती येण्यासाठी सायंकाळ उजाडण्याची शक्यता आहे. शहराच्या इतर भागांतील विजयाचे जल्लोष सुरू झाले असताना, बाणेर-बालेवाडी परिसरात मात्र शांतता आणि निकालाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. प्रतिष्ठेची लढत अमोल बालवडकर यांनी प्रभागात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक लढवली आहे. त्यांच्या विरोधात भाजपने लहू बालवडकर यांना मैदानात उतरवल्याने ही लढत एकाच कुटुंबातील आणि 'बालवडकर विरुद्ध बालवडकर' अशी रंगली आहे. 'कामाचा माणूस' ही आपली प्रतिमा मतदारांनी स्वीकारली का? की पक्षबदलाचा फटका बसला? याचे उत्तर काही तासांतच स्पष्ट होईल. वसंत मोरे यांचा पराभव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी कात्रज परिसरातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेल्या वसंत मोरे यांना मात्र, प्रत्यक्षात मतदार संघातील मतदारांची साथ मिळाली नसल्याचे निवडणुकीच्या निकालातून दिसून आले आहे. निवडणुकीमध्ये वसंत मोरे यांचा दारुण पराभव झाल्यास घडला आहे.
पुणे मनपा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान प्रभाग क्रमांक २५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी गंभीर आक्षेप घेतला आहे. न्यू इंग्लिश स्कूल येथील मतमोजणी केंद्रावर पोलिंग एजंटसमोर आलेल्या १७ ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. रूपाली ठोंबरे पाटील यांच्या आक्षेपामुळे मतमोजणी प्रक्रिया तब्बल दोन तास थांबवण्यात आली. ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मध्यस्थी केली. त्यानंतर झालेल्या मतमोजणी रूपाली पाटील ठोंबरे यांचा पराभव झाला. रूपाली पाटील-ठोंबरे या प्रभाग २५ मधून रिंगणात होत्या. या ठिकाणी राघवेंद्र मानकर (भाजप) २८६१० मतांनी निवडून आले. सोबतच दिवंगत मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक (भाजप), दिवंगत गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट (भाजप), स्वप्नाली नितीन पंडित हे उमेदवार विजयी झाले. रूपाली पाटील ठोंबरे यांच्या म्हणण्यानुसार, ११ जानेवारी रोजी पोलिंग एजंट, पंच आणि निवडणूक अधिकारी (ARO) यांच्या उपस्थितीत मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीनची अधिकृत यादी तयार करण्यात आली होती. या यादीवर त्यांच्या प्रतिनिधींच्या सह्याही घेण्यात आल्या होत्या. मतमोजणीच्या दिवशी टेबलवर त्याच क्रमांकाच्या मशीन येणे अपेक्षित होते, परंतु प्रत्यक्षात दुसऱ्याच क्रमांकाच्या मशीन आल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे (ARO) विचारणा केली असता, त्यांनी ११ जानेवारीची यादी दाखवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला. लोकशाही प्रक्रियेनुसार निवडणूक निकाल पारदर्शकपणे जाहीर व्हावा, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सध्या तसे घडत नसल्याचे दिसत आहे. निवडणूक अधिकारी पोलिसांच्या माध्यमातून दमदाटी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. एखाद्या मशीनमध्ये बदल झाल्यास त्याची कायदेशीर प्रक्रिया असते. संबंधित उमेदवारांना याची माहिती दिली जाते, त्यांच्या सह्या घेतल्या जातात आणि व्हिडिओ शूटिंगही केले जाते. मात्र, या प्रकरणात कोणतीही माहिती अद्याप आपल्याला दिली गेली नसल्याचे रूपाली पाटील ठोंबरे यांनी नमूद केले. यावर आपले समाधान न झाल्यास, तातडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या मतमोजणी रूपाली पाटील-ठोंबरे यांचा पराभव झाला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ मंत्री गणेश नाईक यांच्यातील तीव्र राजकीय संघर्षामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमताच्या दिशेने जोरदार वाटचाल केली आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजप 72 जागांवर आघाडीवर असून, शिंदे गटाची शिवसेना केवळ 28 जागांवर आघाडीवर आहे. या आकडेवारीमुळे नवी मुंबईतील सत्ता संघर्षात भाजपने निर्णायक आघाडी घेतल्याचं स्पष्ट झालं असून, गणेश नाईक यांनी दिलेलं ‘टांगा पलटी’चं विधान प्रत्यक्षात उतरल्याचं चित्र दिसत आहे. नवी मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना या दोन्ही पक्षांनी निवडणुकीपूर्व काळात सर्व ताकद पणाला लावली होती. प्रचारादरम्यान केवळ राजकीय रणनीतीच नव्हे, तर वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांचाही जोर पाहायला मिळाला. याच काळात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील शाब्दिक युद्ध अधिक तीव्र झालं. शिंदे यांनी गणेश नाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तर त्याला उत्तर देताना गणेश नाईक यांनीही आक्रमक भूमिका घेत शिंदेंवर थेट आव्हान दिलं. या वादामुळे नवी मुंबईची निवडणूक केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता राज्यस्तरीय चर्चेचा विषय बनली. गणेश नाईक यांनी शिंदेंवर केलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे होते. एकनाथ शिंदे यांच्याकडे ‘हरामाचा पैसा’ असल्याचा आरोप करत नवी मुंबईच्या विकासासाठी असलेल्या सिडकोच्या जमिनी विकून त्यांनी भ्रष्टाचार केल्याचं नाईक यांनी जाहीरपणे म्हटलं होतं. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने सांगितल्यास शिंदेंचा भ्रष्टाचार बाहेर काढू, त्यांचा ‘टांगा पलटी, घोडे फरार’ करू, असं थेट आव्हान नाईकांनी दिलं होतं. निवडणुकीच्या निकालांनंतर भाजपची मोठी आघाडी पाहता, नाईक यांनी दिलेलं आव्हान प्रत्यक्षात उतरल्याचं समर्थकांकडून सांगितलं जात आहे. शिंदेंचा ‘टांगा पलटी, घोडे फरार’ झाला या निकालानंतर भाजपचे नेते संजीव नाईक यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, शिंदे यांनी निवडणुकीदरम्यान जनतेला अवास्तव आश्वासनं दिली. नगरविकास खात्याचं मंत्री असल्याचं सांगत लोकांना धमक्या दिल्या गेल्या. मात्र, पाच वर्षांसाठी केवळ दोन तास नवी मुंबईत येऊन जनता आपल्या सोबत राहील, असा भ्रम कुणीही ठेवू नये, असा टोला संजीव नाईक यांनी लगावला. त्यामुळेच शिंदेंचा ‘टांगा पलटी, घोडे फरार’ झाला, असा दावा त्यांनी केला. शिंदे यांच्याकडे हरामाचाच पैसा संजीव नाईक यांनी शिंदेंवरील आरोप आणखी तीव्र करताना सांगितलं की, शिंदे यांच्याकडे हरामाचाच पैसा आहे. कोणाकोणाकडून, विशेषतः कंत्राटदारांकडून पैसा कसा घेतला गेला याची सविस्तर यादी आमच्याकडे आहे, असा दावा त्यांनी केला. उद्यापासून खरी लढाई सुरू होईल, असं सांगत त्यांनी शिंदेंना उघड आव्हान दिलं. शिंदेंनी केवळ गणेश नाईकांनाच नव्हे, तर नवी मुंबईच्या जनतेलाही हलक्यात घेतलं आणि त्याचाच परिणाम म्हणजे हा पराभव असल्याचं संजीव नाईक म्हणाले. कामाची विश्वासार्हता यावरच जनता निर्णय देते गणेश नाईक यांच्याबाबत बोलताना संजीव नाईक यांनी कोविड काळाचा उल्लेख केला. सत्ता नसतानाही गणेश नाईक यांनी नागरिकांची कामं केली, लोकांच्या अडचणी सोडवल्या आणि त्यामुळेच नवी मुंबईकर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, असं त्यांनी स्पष्ट केलं. पाच वर्षांत फक्त दोन तास शहरात येऊन विकास करतो असं म्हणणं चालणार नाही, असं सांगत त्यांनी शिंदे गटाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. स्थानिक प्रश्न, सातत्याने संपर्क आणि कामाची विश्वासार्हता यावरच जनता निर्णय देते, असंही त्यांनी ठामपणे मांडलं. निकाल भविष्यातील राज्याच्या राजकारणावरही परिणाम करणारा एकूणच नवी मुंबई महापालिकेचा हा निकाल केवळ पक्षीय विजय-पराजयापुरता मर्यादित राहिलेला नाही. शिंदे–नाईक वाद, भ्रष्टाचाराचे आरोप, ‘टांगा पलटी’सारखी आक्रमक भाषा आणि त्यातून निर्माण झालेलं राजकीय वातावरण यामुळे हा निकाल भविष्यातील राज्याच्या राजकारणावरही परिणाम करणारा ठरणार असल्याचं चित्र आहे. भाजपने मिळवलेली मोठी आघाडी आणि शिंदे गटाची पिछेहाट यामुळे नवी मुंबईत सत्ता समीकरण स्पष्ट झालं असून, या संघर्षाचे पडसाद येत्या काळात राज्याच्या राजकारणातही उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या आणि राजकीय वातावरण तापवणाऱ्या प्रभाग क्रमांक 29-अ मधील लढतीचा अखेर निकाल लागला असून, या निकालाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक बडगुजर यांचा दारुण पराभव केला आहे. या लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते, कारण या निवडणुकीत भाजपमधील एबी फॉर्म वाद, बंडखोरी आणि वडील–मुलामधील वेगवेगळ्या प्रभागांतील निकाल एकाच वेळी चर्चेत आले. मुकेश शहाणे हे पूर्वाश्रमीचे भाजपचे नगरसेवक असून, एबी फॉर्म वाटपावरून निर्माण झालेल्या वादामुळे त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली नव्हती. याच पार्श्वभूमीवर भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र, या कारवाईला न जुमानता शहाणे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. थेट भाजपच्या उमेदवारालाच आव्हान देत त्यांनी प्रचारात आक्रमक भूमिका घेतली आणि अखेर मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत मोठ्या फरकाने विजय दिला. या लढतीला आणखी वेगळं परिमाण मिळालं ते दीपक बडगगुजर यांच्या उमेदवारीमुळे. दीपक बडगुजर हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रभाग क्रमांक 25 मधून विजयी झालेले सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव आहेत. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या दीपक बडगुजर यांना या निवडणुकीत मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, अपक्ष उमेदवार असलेल्या मुकेश शहाणे यांच्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि पहिल्याच निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे वडील विजयी, मुलगा पराभूत अशी परिस्थिती नाशिकच्या राजकारणात पाहायला मिळाली. एकीकडे प्रभाग क्रमांक 25 मधून सुधाकर बडगुजर यांनी स्वतः दणदणीत विजय मिळवत महापालिकेत प्रवेश केला असला, तरी दुसरीकडे त्याच वेळी त्यांच्या मुलाचा झालेला पराभव भाजपसाठी आणि बडगुजर कुटुंबासाठी राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, प्रभाग 25 चा निकालही भाजपसाठी संपूर्णपणे समाधानकारक ठरलेला नाही. या प्रभागातील चार जागांपैकी केवळ दोन जागांवर भाजपला यश मिळाले, तर उर्वरित दोन जागांवर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी बाजी मारली. प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपकडून सुधाकर बडगुजर आणि साधना मटाले हे विजयी झाले आहेत. मात्र, शिवसेना शिंदे गटाकडून कविता नाईक, तर शिवसेना ठाकरे गटाकडून मुरलीधर भांबरे यांनी विजय मिळवला आहे. याच प्रभागात भाजपने पुरस्कृत केलेले भाग्यश्री ढोमसे आणि प्रकाश अमृतकर यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे या प्रभागाचा निकालही भाजपसाठी मिश्र स्वरूपाचा ठरला आहे. दरम्यान, संपूर्ण नाशिक शहराचे लक्ष प्रभाग क्रमांक 29-अ कडे लागण्याचे प्रमुख कारण म्हणजे भाजपमधील एबी फॉर्म वाटपातील गोंधळ. एकीकडे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून दीपक बडगुजर रिंगणात होते, तर दुसरीकडे पूर्वी भाजपचे नगरसेवक राहिलेले आणि आता अपक्ष म्हणून उभे राहिलेले मुकेश शहाणे होते. या थेट लढतीमुळे हा प्रभाग निवडणुकीतील सर्वात हायव्होल्टेज मतदारसंघ ठरला होता. दीपक बडगुजर यांचा पहिल्याच निवडणुकीत पराभव मुकेश शहाणे यांचा हा विजय राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला जात आहे. शहाणे यांनी यापूर्वी 2012 मध्ये निवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांना कमी मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 2017 मध्ये त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. आता 2026 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवून त्यांनी पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. दुसरीकडे, दीपक बडगुजर यांना पहिल्याच निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्याने नाशिकच्या राजकारणात हा निकाल मोठा धक्का देणारा ठरला आहे.
राज्यातील मुंबईसह 29 महापालिकांचे निकाल आता वेगाने हाती येत आहेत. आतापर्यंतच्या निकालांत सत्ताधारी भाजपने बहुतांश महापालिका आपल्या ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. विशेषतः मुंबई महापालिकेत भाजप व शिंदे गटाने शिवसेनेच्या ठाकरे गटाची सत्ता उलथावून लावत सत्ता हस्तगत केली आहे. याठिकाणी महायुतीला 125 च्या वर जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीला जोरदार झटका बसला आहे. या बातमीत खालील तक्त्यांत आपण पाहू राज्यातील निवडक महापालिकांतील पक्षनिहाय स्थिती… मुंबई महापालिका (एकूण जागा -227) पुणे महापालिका (एकूण जागा -165) नागपूर महापालिका (एकूण जागा -151) छत्रपती संभाजीनगर (एकूण जागा -115) पिंपरी चिंचवड महापालिका (एकूण जागा -128) ठाणे महापालिका (एकूण जागा -131) नाशिक महापालिका (एकूण जागा -122) नवी मुंबई महापालिका (एकूण जागा -111) कोल्हापूर महापालिका (एकूण जागा -81) सांगली मिरज कुपवाड महापालिका (एकूण जागा -78) सोलापूर महापालिका (एकूण जागा -102) लातूर महापालिका (एकूण जागा -70) अहिल्यानगर महापालिका (एकूण जागा -68) अमरावती महापालिका (एकूण जागा -87) नांदेड वाघाळा महापालिका (एकूण जागा -81) जळगाव महापालिका (एकूण जागा -75) जालना महापालिका (एकूण जागा -65) चंद्रपूर महापालिका (एकूण जागा -66) वसई विरार महापालिका (एकूण जागा -115) मालेगाव महापालिका (एकूण जागा -84) अकोला महापालिका (एकूण जागा -80) पनवेल महापालिका (एकूण जागा -78) मिरा-भाईंदर महापालिका (एकूण जागा -95) (सूचना - ही आकडेवारी सातत्याने अपडेट होईल.)
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या प्रभाग क्रमांक 173 चा अखेर निकाल समोर आला असून, या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. भाजपचा कथित डुप्लिकेट एबी फॉर्म वापरून निवडणूक लढवलेल्या शिल्पा केळुसकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळे यांचा पराभव केला आहे. शिल्पा केळुसकर यांनी 1,722 मतांनी विजय मिळवत या प्रभागावर आपलं नाव कोरलं असून, हा निकाल शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रभाग क्रमांक 173 हा महायुतीतील जागावाटपामुळे आधीच संवेदनशील ठरला होता. महायुतीअंतर्गत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडण्यात आली होती. त्यामुळे भाजपकडून या प्रभागात अधिकृत उमेदवार देण्यात येणार नव्हता. शिंदेंच्या शिवसेनेने या जागेवर माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या निर्णयानंतरही भाजपच्या शिल्पा केळुसकर यांनी अपक्ष पद्धतीने का होईना, पण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे ही लढत अधिकच लक्षवेधी ठरली. निवडणुकीपूर्वी घडलेला एबी फॉर्मचा वाद या लढतीला वेगळंच वळण देणारा ठरला. सुरुवातीला भाजपकडून शिल्पा केळुसकर यांना अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, नंतर ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला गेल्यानंतर भाजपने केळुसकरांकडून तो एबी फॉर्म परत मागवून घेतला. असे असतानाही शिल्पा केळुसकर यांनी त्या एबी फॉर्मची रंगीत झेरॉक्स प्रत काढून ती जोडत निवडणूक अर्ज दाखल केला. हा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा झाली होती. हा मुद्दा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून शिल्पा केळुसकर यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरू नये, अशी मागणी केली होती. एबी फॉर्मची झेरॉक्स जोडून अर्ज भरणे हे नियमबाह्य असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता. मात्र, या सर्व घडामोडींनंतरही निवडणूक आयोगाने शिल्पा केळुसकर यांचा अर्ज वैध ठरवला आणि त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली. प्रचारादरम्यान केळुसकर आणि कांबळे यांच्यातील लढत अधिकच तीव्र झाली होती. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी पाहायला मिळाल्या. शिल्पा केळुसकर यांच्या समर्थकांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला उद्देशून ‘50 खोके एकदम ओक्के’ अशा घोषणा देत प्रचारात वातावरण तापवलं होतं. याला प्रत्युत्तर म्हणून शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केळुसकर यांना ‘एबी फॉर्म चोर’ अशी हाक मारत टीका केली होती. त्यामुळे हा प्रभाग निवडणूक काळात सतत चर्चेत राहिला. अखेर मतमोजणीअंती शिल्पा केळुसकर यांनी 1,722 मतांची निर्णायक आघाडी घेत पूजा कांबळे यांचा पराभव केला. महायुतीत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आली असतानाही भाजपच्या पार्श्वभूमीच्या उमेदवाराने विजय मिळवणं, हा शिंदेंच्या सेनेसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. विशेषतः रामदास कांबळे हे शिंदेंचे माजी नगरसेवक असल्यानं या पराभवाकडे अधिक गंभीरपणे पाहिलं जात आहे. राजकीय आणि कायदेशीर पडसाद उमटण्याची शक्यता या निकालानंतर आता प्रभाग क्रमांक 173 मधील एबी फॉर्म प्रकरणाचे राजकीय आणि कायदेशीर पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर विरोधकांनी आधीच प्रश्न उपस्थित केले होते, तर शिल्पा केळुसकर यांच्या विजयामुळे हा वाद आणखी गडद होण्याची चिन्हं आहेत. मुंबई महापालिकेच्या राजकारणात हा निकाल केवळ एका प्रभागापुरता मर्यादित न राहता, महायुतीतील अंतर्गत तणाव आणि समन्वयाच्या अडचणीही समोर आणणारा ठरला आहे.
महापालिका निवडणूक २०२६:महापालिका निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी अखेर निवडणूक आयोगाकडून जारी
महाराष्ट्रात १५ जानेवारी रोजी झालेल्या २९ महापालिकांच्या मतदानाची आकडेवारी अखेर आज निकालाच्या दिवशी १६ जानेवारी रोजी राज्या निवडणूक आयोगाने जाहीर केली. त्यानुसार इचलकरंजी महानगरपालिकेत सर्वात जास्त ६९.७६% मतदान झाल्याचे समोर आले आहे. सर्वात कमी मतदान मीरा-भाईंदर महानगरपालिका ४८.६४% टक्के झाले आहे. बृहन्मुंबई महापालिकेत ५२.९४ टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. ठाणे महापालिकेसाठी ५५.५९, कल्याण - डोंबिवली महापालिकेसाठी ५०.३२ टक्के, नवी मुंबई महापालिकेसाठी ५७.१५ टक्के, पुणे महापालिकेसाठी ५२.४२ टक्के, छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी ५९.८२ टक्के, नाशिक महापालिकेसाठी ५६.६७ टक्के आणि जळगाव महापालिकेसाठी ५३.६० टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील सर्व महापालिकेसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे…
लातूरच्या पहिल्या महापौर स्मिता खानापुरे पराभूत
लातूर : लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आज माजी महापौरांच्या प्रतिष्ठेचा फैसला झाला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून झालेल्या पाच महापौरांपैकी चार जण यावेळेस रिंगणात होते. मात्र, मतदारांनी अनुभवापेक्षा रणनीती आणि नवीन समीकरणांना पसंती दिल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या पहिल्या महापौर प्रा. स्मिता खानापुरे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला असून भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांनी त्यांना धूळ चारली आहे. […] The post लातूरच्या पहिल्या महापौर स्मिता खानापुरे पराभूत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठवाड्यातील सर्वात मोठी महापालिका असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल वेगाने हाती येत आहेत. त्यात सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या सिद्धांत व हर्षदा शिरसाट या दोन्ही मुलांचा विजय झाला आहे. संभाजीनगरात सध्या भाजप सर्वाधिक जागा जिंकून आघाडीवर असून, शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी भाजपचे 97, शिदे गटाचे 92, ठाकरे गटाचे 97, काँग्रेसचे 77, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे 77 व एमआयएमचे 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट हा प्रभाग क्रमांक 29 अ मधून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांची लडथ भाजपचे भगवान गायकवाड व ठाकरे गटाच्या किशोर साबळे यांच्याशी होता. सिद्धांत, हर्षदा शिरसाट यांचा विजय दुसरीकडे, हर्षदा शिरसाट या प्रभाग क्रमांक 18 अ मधून महापालिकेच्या रणांगणात होत्या. त्यांचा सामना भाजपच्या मयुरी बर्थने यांच्याशी होता. विशेष म्हणजे सिद्धांत शिरसाट हे यापूर्वी महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. पण हर्षदा यांची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे संजय शिरसाट यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक बनली होती. त्यात या दोघांनीही आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना धोबीपछाड देत विजय मिळवला. यामुळे शिरसाट यांना मोठा दिलासा मिळाला. गुलमंडीत सचिन खैरे यांचा विजय दुसरीकडे, संभाजीनगरची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गुलमंडी प्रभागात (15 अ) ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांचा विजय झाला आहे. मागच्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. पण यावेळी त्यांचा विजय झाला. हा प्रभाग ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे येथील ठाकरे गटाचा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आज झालेल्या मतमोजणीत सुरुवातीला एमआयएमच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे ठाकरे गटाची काहीशी धाकधूक वाढली होती. पण अखेर सचिन खैरे यांनी विरोधकांना पराभवाची धूळ चारत बाजी मारली. रशीद मामूंचे काय होणार? उल्लेखनीय बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगर महापालिकेत गरम पाणी वॉर्डातून नगरसेवक व आरक्षणामुळे महापौरपदावर वर्णी लागलेले माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ रशीद मामू यांची राज्यभर चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाने त्यांना प्रभाग क्रमांक 4 ब मधून उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत MIM च्या खान अमीर अनवर यांच्याशी आहे. रशीद मामूंच्या उमेदवारीला चंद्रकांत खैरे यांनी विरोध केला होता. प्रचारासाठी जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. पण आज सुरू असलेल्या मतमोजणीत रशीद मामू आघाडीवर आहेत.
लातूरमध्ये काँग्रेस-वंचितची मुसंडी, भाजपला प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य भोवले
लातूर : मराठवाड्यातील पाच महानगरपालिका निवडणुकीपैकी परभणी आणि लातूरमध्ये भाजपसाठी अजून साजेसे चित्र दिसत नाही. छत्रपती संभाजीनगरनंतर नवनिर्मित जालना महानगरपालिकेत भाजपच्या विजयाचे वारू उधळले गेले आहे. तर नांदेडमध्ये सुद्धा भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. लातूरमध्ये मोठा करिष्मा करण्याची आणि काँग्रेसचा सफाया करण्याच्या वल्गणा भाजपने केल्या होत्या. तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस औषधालाही नसेल आशा आशयाचे वक्तव्य […] The post लातूरमध्ये काँग्रेस-वंचितची मुसंडी, भाजपला प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य भोवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या टप्प्यातच राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. एकूण 87 जागांच्या अमरावती महापालिकेत काही प्रभागांचे निकाल हाती येताच वातावरण तापलं आहे. विशेषतः पहिल्याच फेरीत भाजपला दोन मोठे धक्के बसल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचे भाऊ तुषार भारतीय या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांचा पराभव झाला आहे. प्रभाग क्रमांक 14 मधील निकाल भाजपसाठी विशेष धक्कादायक ठरले आहेत. या प्रभागातून काँग्रेसने क्लीन स्वीप साधत चारही जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांचा याच प्रभागात पराभव झाला आहे. काँग्रेसच्या विजयामुळे मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. फटाके, घोषणा आणि ढोल-ताशांच्या गजरात काँग्रेस समर्थकांनी या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केलं. भाजपसाठी हा निकाल अनपेक्षित मानला जात असून, सुरुवातीच्या फेरीतच सत्ता समीकरणांवर परिणाम होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. प्रभाग क्रमांक 14 अ मधील निकालांचा तपशील पाहिला तर काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपवर स्पष्ट आघाडी घेतल्याचं दिसून येतं. विलास इंगोले यांनी भाजपचे अविनाश देऊळकर यांचा 12,217 विरुद्ध 4,934 मतांनी पराभव केला. सुनीता भेले यांनी संगीता बुरंगे यांचा 7,397 विरुद्ध 3,770 मतांनी पराभव केला. सुशीला रतावा यांनी गंगा खारकर यांच्यावर 8,625 विरुद्ध 5,956 मतांची आघाडी घेत विजय मिळवला. तर संजय शिरभाते यांनी भाजपचे विवेक कलोती यांचा 5,645 विरुद्ध 4,726 मतांनी पराभव करत भाजपला मोठा धक्का दिला आहे. आमदार श्रीकांत भारतीय यांचे भाऊ तुषार भारतीय पराभूत दुसरीकडे, साई नगर प्रभागातील निकालांनीही भाजपच्या अडचणी वाढवल्या आहेत. या प्रभागात भाजपचे नेते तुषार भारतीय यांचा पराभव झाला आहे. आमदार श्रीकांत भारतीय यांचे भाऊ असलेल्या तुषार भारतीय यांच्याकडून भाजपला मोठी अपेक्षा होती. मात्र रवी राणांचे निकटवर्तीय आणि युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांनी विजय मिळवत बाजी मारली आहे. साई नगरमधील ही निवडणूक आमदार रवी राणांनी प्रतिष्ठेची बनवली होती. त्यामुळे या निकालाला स्थानिक राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढती या निवडणुकीत अमरावतीत राजकीय लढत बहुरंगी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, बसपा आणि युवा स्वाभिमान पार्टी यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड फोरम यांनी आघाडी करत निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी आणि समाजवादी पक्षाने काही जागांवर आघाडी करून उमेदवार दिले होते, तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढती लढवल्या.
‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चे मराठी प्रेम
मुंबई : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकासाठी आज मतदान पार पडले आहे. मुंबईत अनेक सेलिब्रिटी मंडळीही आपला मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळाली. अशातच अभिनेता आमिर खानही त्याचे मत देऊन बाहेर आला. तेव्हा त्याच्यासोबत एक घटना घडली, जी सध्या तुफान व्हायरल होत आहे. आमिर खाननेही आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, मतदान केंद्राबाहेर माध्यमांशी संवाद साधताना आमिरने जे विधान […] The post ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चे मराठी प्रेम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे माबूद बागवान यांची शुक्रवारी ता. १६ बिनविरोध निवड झाली आहे. या शिवाय शिवसेनेच्या दोन, भाजपाच्या एक तर राष्ट्रवादीच्या एका स्विकृत सदस्याचीही निवड झाली आहे. या निवडीनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. हिंगोली येथील पालिकेच्या सभागृहात शिवसेनेच्या नगराध्यक्षा रेखा श्रीराम बांगर यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे १६, राष्ट्रवादीचे १०, काँग्रेसचे दोन, भाजपाचे पाच नगरसेवकांची उपस्थिती होती. या शिवाय पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांचीही यावेळी उपस्थिती होती. हिंगोली पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे माबूद बागवान यांचा उपनगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची निवड जाहिर करण्यात आली आहे. या शिवाय शिवसेनेचे स्विकृत सदस्य पदी गुड्डू बांगर, नितीन बांगर, राष्ट्रवादीचे शेख शकील, भाजपाचे कैलास शहाणे यांची निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले आहे. दरम्यान, उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल तसेच स्विकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माबूद बागवान, गुड्डू बांगर, नितीन बांगर यांचा सत्कार केला. तर राष्ट्रवादीने शेख शकील तर भाजपाच्या पदाधिकारी व कार्यर्त्यांनी कैलास शहाणे यांचा सत्कार केला. दरम्यान, शिवसेनेचे आमदार संतोष बांगर, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, ॲड. अविनाश बांगर, गणेश बांगर, संदीप मुदीराज, संतोष गोरे, यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. चौकटीचा मजकूर माबूद बागवान यांच्या प्रभागात शिवसेनेला जास्त मताधिक्य पालिका निवडणुकीत माबूद बागवान यांच्या प्रभागातून शिवसेनेला नगराध्यक्षपदासाठी सर्वात जास्त २७०० मतांंची आघाडी मिळाली होती. त्यामुळे उपनगराध्यक्षपदी माबूद बागवान यांचीच निवड होईल अशी अपेक्षा होती. त्यानंतरही आमदार संतोष बांगर कोणाच्या पारड्यात वजन टाकणार यावर सर्वबाबी अवलंबून होत्या. त्यानंतर आमदार बांगर यांनी माबूद बागवान यांच्या निवडीला हिरवा कंदील दाखविला.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या निकालानंतर हिंदीभाषक आणि उत्तर भारतीयांचे आभार मानले. भाजप मुंबई तोडणार नाही, तर ती जोडणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर दहिसरमधील वॉर्ड क्रमांक तीनमधून विजयी झाले. या विजयानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिव्य मराठीशी बोलताना दिली. मराठी भाषक आणि उत्तर भारतीयांमध्ये तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न झाला. मात्र, मुंबईकर आणि मराठी माणसांनी त्यांना उत्तर दिले. इथे सारे गुण्यागोविंदाने नांदत आहेत, हे दाखवून दिले, असा टोलाही त्यांनी ठाकरे बंधूंना नाव न घेता हाणला. प्रचंड आनंद देणारा विजय भाजप नेते प्रवीण दरेकर दिव्य मराठीशी बोलताना म्हणाले की, आज आम्हाला खूप आनंद आहे आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेले परिश्रम आणि देवाभाऊ आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा असणारा विश्वास हा या ठिकाणी दिसला. त्यामुळे हा विजय आम्हाला प्रचंड आनंद देणारा असा आहे.' तेढ निर्मितीचा प्रयत्न फसला भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, 'हिंदीभाषी, उत्तर भारतीयांचा मनापासून आभारी आहे. खरे म्हणजे मराठी भाषक आणि उत्तर भारतीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता. परंतु मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी दाखवून दिलं उत्तर भारतीय सुद्धा आमच्यासोबत इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. उत्तर भारतीयांनी दाखवलं या मातीनं आम्हाला मोठें केले आहे. या मातीचा सन्मान केला पाहिजे.म्हणून ते ही आमच्याबरोबर आहेत. उपकाराचे प्रचंड बरडन भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, 'भाजप मुंबई तोडणार नाही. आम्ही मुंबई जोडणार आहोत. मुंबई आता आम्ही जोडलेली आहे. याही पुढे जाऊन आमचे मुंबई मिशन आमचे सगळे नगरसेवक रांगेत जिंकून येत आहेत. आमचे हर्षद कारकर आहेत. उमेदवार संजय घाडी आणि त्यांच्या पत्नी संजना घाडी आहेत. हे ताकदीने त्या ठिकाणी उभे राहिले. महायुतीचा परिवार म्हणून आम्ही हा वेगळा आनंद सध्या उपभोगतो आहेत आणि मुंबईकरांचे उपकार कसे फेडायचे याचे बरडन आमच्या मनावर आहे.'
मुंबई महापालिकेतील प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. याठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा पराभव झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निशिकांत शिंदे यांनी अतितटीच्या लढतीत त्यांचा पराभव झाला आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता महापालिका निवडणुकीतही ठाकरे गटाने त्यांच्या मुलाचा पराभव केला आहे. यामुळे सदा सरवणकर यांना दुहेरी झटका सहन करावा लागला आहे. दादर - प्रभादेवीतील वॉर्ड 194 मध्ये ठाकरे व शिंदे गटात अत्यंत हायव्होल्टेज लढत होती. शिवसेनेतील फुटीनंतर हा वॉर्ड शिंदे गट व ठाकरे गटातील संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला होता. आजी आमदार महेश सावंत यांनी पुन्हा एकदा कधी काळचे आपले गुरू माजी आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात शड्डू ठोकला. ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांचा पराभव केला होता. त्यामुळे सरवणकरांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. महापालिका निवडणुकीत राज व उद्धव ठाकरे यांनी युती केली होती. या दोघांच्या युतीत हा वॉर्ड ठाकरे गटाच्या वाट्याला सुटला होता. निशिकांत शिंदेंनी दिली समाधान सरवणकरांना मात प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 वर मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी व ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांनी दावा केला होता. पण हा प्रभाग उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला गेल्यामुळे संतोष धुरी नाराज झाले होते. त्यांनी राज ठाकरे यांनी उद्धव यांच्यापुढे सपशेल लोटांगण घातल्याचा आरोप करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. याठिकाणी शिंदे गटाचे समाधान सरवणकर विरुद्ध निशिकांत शिंदे अशी अत्यंत चुरशीची लढत झाली होती. त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत निशिकांत शिंदे यांनी समाधान सरवणकर यांचा 592 मतांनी पराभव केला. सरवणकर व महेश सावंत यांच्यात राजकीय हाडवैर उल्लेखनीय बाब म्हणजे प्रभादेवी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. सदा सरवणकर व महेश सावंत यांच्यात मागील काही वर्षांपासून संघर्ष वाढला आहे. 2017 मध्ये महेश सावंत यांना डावलून सदा सरवणकर यांनी मुलगा समाधान सरवणकर याच्यासाठी उमेदवारी घेतली. त्यानंतर सावंत यांनी बंडखोरी केली. मात्र, त्यांना अवघ्या 252 मतांनी पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर महेश सावंत यांनी शिवसेनेत घरवापसी केली. शिवसेना फुटल्यानंतर सदा सरवणकर हे शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर प्रभादेवीत दोन्ही गटात राडा झाला. एका प्रसंगात सरवणकर यांनी पिस्तुलीतून गोळी झाडल्याचाही आरोप झाला.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या वानवडी-साळुंके विहार परिसरातील प्रभाग क्रमांक 18 ड चा निकाल अखेर समोर आला असून, या निकालाने शहरातील राजकीय समीकरणांना नवी दिशा दिली आहे. या प्रभागातून काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी भाजपचे अभिजीत शिवरकर यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. निवडणूक प्रचाराच्या काळापासूनच ही लढत प्रतिष्ठेची आणि अत्यंत चुरशीची मानली जात होती. मतमोजणीदरम्यानही या लढतीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या प्रशांत जगताप यांनी निर्णायक टप्प्यावर बाजी मारत विजय आपल्या नावावर केला आणि वानवडी-साळुंके विहार प्रभागात काँग्रेसचा झेंडा फडकवला. मतमोजणीच्या पहिल्या फेऱ्यांमध्ये भाजपचे अभिजीत शिवरकर आघाडीवर होते. त्यामुळे या प्रभागात भाजपच बाजी मारणार, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, पुढील फेऱ्यांमध्ये चित्र बदलू लागलं. प्रशांत जगताप यांनी हळूहळू शिवरकर यांची आघाडी कमी करत अखेर लीड मोडून काढली. एकदा आघाडी मिळवल्यानंतर त्यांनी ती शेवटपर्यंत कायम ठेवत विजय साकारला. अंतिम निकालात प्रशांत जगताप यांनी 1534 मतांनी विजय मिळवला. हा फरक कमी असला तरी लढतीची तीव्रता आणि मतदारांचा कौल लक्षात घेता हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. प्रशांत जगताप यांचा हा विजय केवळ एका प्रभागापुरता मर्यादित नसून, त्यामागे मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. जगताप हे अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले होते. पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या आणि स्थानिक पातळीवर त्यांचा मजबूत जनसंपर्क होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही त्यांनी शरद पवारांची साथ सोडली नव्हती. मात्र, जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जगताप यांनी या निर्णयाशी असहमती दर्शवत आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पक्षाला रामराम केला. हा निर्णय त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या धाडसी आणि जोखमीचा मानला जात होता. राष्ट्रवादी सोडल्यानंतर प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे त्यांच्यावरील अपेक्षा वाढल्या होत्या. त्यामुळे वानवडी-साळुंके विहार प्रभागातील ही निवडणूक जगताप यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी आक्रमक प्रचार करत स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. पक्षांतरानंतरही मतदार आपल्यावर विश्वास ठेवतील का, हा प्रश्न त्यांच्या समोर होता. मात्र, निकालाने हे स्पष्ट केलं की, जगताप यांचा वैयक्तिक संपर्क आणि स्थानिक पातळीवरील काम मतदारांनी स्वीकारलं आहे. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र या लढतीत प्रशांत जगताप यांच्यासमोर भाजपचे उमेदवार अभिजीत शिवरकर होते. अभिजीत शिवरकर हे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र आहेत. त्यामुळे या निवडणुकीला राजकीय वारसाहक्काचीही किनार होती. भाजपने या प्रभागात पूर्ण ताकद लावली होती. मात्र, अटीतटीच्या या लढतीत अखेर प्रशांत जगताप यांनी बाजी मारली. विजयाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. पुण्याच्या राजकारणात त्यांची भूमिका अधिक निर्णायक या निकालामुळे पुणे महापालिकेच्या राजकारणात काँग्रेससाठी महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. प्रशांत जगताप यांच्या विजयामुळे काँग्रेसने पुण्यात आपलं खातं उघडलं आहे. वानवडी-साळुंके विहार प्रभाग क्रमांक 18 ड चा हा निकाल पुण्यातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. पक्षांतर, प्रतिष्ठेची लढत आणि स्थानिक मुद्द्यांचा प्रभाव या सगळ्यांचा संगम या निवडणुकीत पाहायला मिळाला. प्रशांत जगताप यांनी सुरुवातीची पिछाडी भरून काढत मिळवलेला विजय हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, आगामी काळात पुण्याच्या राजकारणात त्यांची भूमिका अधिक निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे जिल्ह्यातील बाणेर परिसरात प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या रागातून एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली आहे. टोळक्याने महिलेसह चौघांना बेदम मारहाण केल्याची ही घटना घडली असून, या प्रकरणी बाणेर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कल्याणी रामदास धनकुडे (वय ३८, रा. धनशीला बंगला, बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, प्रणित प्रमोद निम्हण, प्रणय प्रमोद निम्हण, प्रसन्न रामभाऊ निम्हण, संदीप नामदेव निम्हण आणि परवेज शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी धनकुडे यांच्या नणंद सरला बाबुराव चांदेरे यांचे पती बाणेरमधून निवडणूक लढवत आहेत. धनकुडे कुटुंबीयांनी चांदेरे यांना पाठिंबा दिल्याने निम्हण कुटुंबीय संतप्त झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कल्याणी धनकुडे त्यांच्या बंगल्याच्या परिसरात थांबल्या होत्या. मतदान प्रक्रिया सुरू असताना आरोपी निम्हण हे धनकुडे यांच्या बंगल्यात शिरले. त्यांनी धनकुडे यांच्या मोटारीवरील चालक सचिन उत्तम फासगे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, ज्यात फासगे जखमी झाले. यानंतर आरोपींनी कल्याणी यांना शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. कल्याणी यांना वाचवण्यासाठी आलेल्या नवनाथ देशमुख यांनाही आरोपींनी काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कल्याणी यांच्या नातेवाईक सायली निलेश शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. आरोपी प्रणित निम्हण याने 'निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला बघून घेतो,' अशी धमकी दिल्याचे कल्याणी धनकुडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कल्याणी यांनी फिर्याद दिल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा गर्दी करून मारामारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक आयुक्त विठ्ठल दबडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सरग या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
राज्यातील महापालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीची विजयी घोडदौड सुरू आहे. जालना महापालिका निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू व भावजयीचा विजय झाला आहे. तर छत्रपती संभाजीनगर येथेही सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांनीही आघाडी घेतली आहे. लातूर महापालिकेत काँग्रेसने भाजपवर आघाडी घेतली आहे. जालना जिल्ह्याच्या महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत 16 प्रभागांतील 65 जागांसाठी तब्बल 454 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे विजयी झाले आहेत. भास्कर दानवे यांच्या पत्नी सुशीला दानवे यांचाही या निवडणुकीत विजय झाला आहे. या विजयामुळे दानवे कुटुंबाचे महापालिकेतील वर्चस्व अधोरेखित झाले आहे. युती तुटल्याने बदलली राजकीय समीकरणे निवडणुकीपूर्वी भाजप व शिंदे गटात जालन्यात युती करण्याची चर्चा सुरू होती. पण या बैठका निष्फळ ठरल्या. अखेर या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व मनसे यांची या निवडणुकीत युती झाली. त्यातच महाविकास आघाडीतील घटक पक्षही स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने प्रत्येक प्रभागात चुरशीची लढत झाली. त्यात आता दानवे पती-पत्नीचा विजय झाला आहे. मराठवाड्यात कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी दुसरीकडे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, लातूर महापालिकेसाठी मतमोजणी कडेकोट बंदोबस्तात सुरू झाली आहे. संभाजीनगरात 4 मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. ताज्या आकडेवारीनुसार, 115 सदस्यीय संभाजीनगर महापालिकेत आतापर्यंत 33 जागांचे निकाल जाहीर झालेत. त्यात भाजपने सर्वाधिक 12 जागांवर विजय मिळवला आहे. अनेक ठिकाणी भाजपने विजयी आघाडी घेतली आहे. शिंदे गटाने आतापर्यंत 6 जागा जिंकल्या असून, ठाकरे गटाने 5 जागांवर यश मिळवले आहे. एमआयएमनेही 5 जागांवर आपले खाते उघडले आहे. काँग्रेसला अवघ्या 3 जागांवर आघाडी मानावी लागली आहे. लातूर महापालिकेत काँग्रेसने 16 जागांवर, भाजपने 12 जागांवर आघाडीवर आहे . नांदेडमध्ये भाजपने 24 जागांवर आघाडीवर असून शिवसेना 12 आणि काँग्रेसने 12 जागांवर आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. परभणीत शिवसेनेने आघाडी घेतली आहे. येथे शिवसेना 8, भाजप 2, तर काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतली आहे.
राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडल्या. निष्ठावंतांना उमेदवारी न मिळाल्याने काही ठिकाणी नाराजीचा सूर उमटला, तर काही प्रभागांमध्ये थेट घराघरांत राजकीय फूट स्पष्टपणे दिसून आली. अशाच एका अत्यंत चर्चेत असलेल्या लढतीकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष वेधलं गेलं होतं, ती म्हणजे दहिसर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 2 ची लढत. फेसबुक लाईव्ह खून प्रकरणानंतर राज्यभरात चर्चेत आलेल्या घोसाळकर कुटुंबातील राजकीय फाटाफुटीचं प्रतिबिंब या निवडणुकीत स्पष्टपणे उमटलं. अखेर दहिसरच्या जनतेने आपला कौल स्पष्ट करत भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केलं आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या या निर्णयामुळे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे, तर घोसाळकर कुटुंबातही मोठी चर्चा रंगली होती. भाजपकडून त्यांना दहिसर वार्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी देण्यात आली आणि त्याचवेळी ही लढत अत्यंत लक्षवेधी ठरणार, हे स्पष्ट झालं. कारण, शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्या विरोधात थेट त्यांच्या मैत्रिणी असलेल्या धनश्री कोलगे यांना मैदानात उतरवलं. परिणामी ही निवडणूक केवळ दोन पक्षांमधील संघर्ष न राहता, मैत्री विरुद्ध मतभेद, निष्ठा विरुद्ध पक्षांतर आणि घरातील राजकीय मतभेद अशा अनेक पातळ्यांवर रंगली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांनी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीअखेर त्यांना 11,964 मतांची आघाडी मिळाली होती, तर शिवसेना ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांना केवळ 4,115 मतांवर समाधान मानावं लागलं होतं. अंतिम निकालात ही आघाडी आणखी वाढली. तेजस्वी घोसाळकर यांनी एकूण 16,484 मतांची कमाई करत 10,755 मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी धनश्री कोलगे यांना 5,729 मतं मिळाली. या निकालाने दहिसर प्रभागात भाजपाचं वर्चस्व अधोरेखित झालं, तर ठाकरे गटासाठी ही लढत धक्कादायक ठरली. या लढतीला वेगळी धार देणारी बाब म्हणजे दोन्ही उमेदवारांमधील वैयक्तिक नातेसंबंध. एकेकाळच्या मैत्रिणी असलेल्या तेजस्वी घोसाळकर आणि धनश्री कोलगे या एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या होत्या. निवडणूक प्रचारादरम्यान धनश्री कोलगे यांनी ही लढत निष्ठावंत विरुद्ध गद्दार, टीव्हीवर दिसणारा चेहरा विरुद्ध रस्त्यावर काम करणारा कार्यकर्ता, बाहेरचा उमेदवार विरुद्ध स्थानिक उमेदवार अशी असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी माध्यमांशी बोलताना ही निवडणूक केवळ पक्षांची नव्हे, तर विचारांची असल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्ष मतदानात दहिसरच्या मतदारांनी वेगळाच कौल दिला. विनोद घोसाळकर स्वतः धनश्री कोलगे यांच्या प्रचारात धनश्री कोलगे या शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकारिणी सदस्य असून दहिसरमधील वार्ड क्रमांक 2 मध्ये त्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. स्थानिक शिवसेना कार्यकर्ती म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती. प्रचारादरम्यान त्यांनी स्पष्ट केलं होतं की, जरी त्यांच्या विरोधात घोसाळकर कुटुंबातील सून उभी असली, तरी माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. विशेष म्हणजे, विनोद घोसाळकर स्वतः धनश्री कोलगे यांच्या प्रचारात सहभागी होताना दिसले. सुनेने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विनोद घोसाळकर यांना अश्रू अनावर झाले होते, अशीही चर्चा झाली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांनी शिवसेना ठाकरे गटासाठी काम करत आपली भूमिका स्पष्ट ठेवली. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई दुसरीकडे, तेजस्वी घोसाळकर यांचा राजकीय प्रवासही तितकाच चर्चेत राहिला आहे. त्या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका असून 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून त्यांनी विजय मिळवला होता. त्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी 2014 मध्ये त्यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतरच तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी वर्णी लागली आणि त्याचवेळी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं. तेजस्वी घोसाळकर यांच्या बाजूने कौल महापालिका निवडणुकांच्या तोंडावर तेजस्वी घोसाळकर यांनी प्रत्यक्ष भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली आणि त्यामुळे दहिसर प्रभागातील राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. कुटुंबातील वेगवेगळ्या भूमिका, पक्षीय मतभेद आणि भावनिक पार्श्वभूमी असूनही मतदारांनी स्पष्ट बहुमताने तेजस्वी घोसाळकर यांच्या बाजूने कौल दिला. या विजयामुळे मुंबई महापालिकेतील भाजपची ताकद वाढली असून, दहिसरमधील ही लढत आगामी काळात राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत बोटावरील शाई पुसण्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. व्होट चोरी एक देशविरोधी कृत्य आहे. विशेषतः निवडणूक आयोगाकडून जनतेची होणारी दिशाभूल हेच लोकशाहीवरील विश्वास संपण्याचे प्रमुख कारण आहे, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह 29 महापालिकांसाठी गुरुवारी मतदान झाले. त्यात निवडणूक प्रक्रियेत बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईवरून मोठा गदारोळ माजला. मतदानानंतर काही वेळातच बोटावरील शाई पुसली जात असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी तर चक्क स्वतःचा फॅक्ट चेक व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर काही वेळातच काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मनसेने या मुद्यावरून रान पेटवले. राज ठाकरे यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवत बोटावरील शाई सॅनिटायझरने निघत असल्याचा आरोप केला. त्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. निवडणुकीत बोटावरील शाई पुसली जात नाही, तर लोकशाही पुसली जात असल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आज निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये एका वृत्तपत्राचे वृत्त पोस्ट करत त्यात बोटावरील शाई कशा प्रकारे पुसली जात आहे हे दिसून येत आहे. व्होट चोरी हे देशविरोधी कृत्य -राहुल गांधी राहुल गांधी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, निवडणूक आयोगाकडून जनतेची होणारी दिशाभूल हेच लोकशाहीवरील विश्वास संपुष्टात येण्याचे प्रमुख कारण आहे. व्होट चोरी हे राष्ट्रविरोधी कृत्य आहे. राहुल गांधींच्या या पोस्टवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी राहुल गांधी यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. तर काहींनी त्यावर विरोध प्रकट केला आहे. विशेषतः अनेकांनी निवडणुकीत बोटाला लावली जाणारी शाई पुसली जाणे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून चिंताजनक असल्याचे मत व्यक्त केले आहे. आत्ता पाहू काय म्हणाले होते राज ठाकरे? राज ठाकरे गुरुवारी मतदानानंतर बोलताना म्हणाले होते, आतापर्यंत मतदानावेळी शाई वापरली जात होती. आज एक नवे पेन (मार्कर) आणले आहे. त्याविरोधात सर्वच बाजूंनी तक्रारी येत आहेत. तुम्ही मतदान करून सॅनेटायझरने शाई पुसली तर ती सहजपणे पुसली जात आहे. सुरुवातीला निवडणूक आयोगाने उमेदवारांना प्रचारासाठी एक दिवस वाढवून दिला. असा कोणताही नियम नाही. पण त्यांनी तो या निवडणुकीत आणला. पैसे वाटण्यासाठी हा नियम आणला. संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी काम करत आहे. आम्ही आमच्या परीने जे काही करायचे आहे ते करतोय. पण हे काही चांगल्या लोकशाहीची लक्षणे नाहीत. निवडणूक आयोगाने फेटाळले होते आरोप राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मनसे व ठाकरे गटाचे आरोप फेटाळून लावले होते. ते म्हणाले होते, राज्य निवडणूक आयोग मार्कर पेन 2011 पासून वापरत आहे. ही शाई बोटावर लावल्यानंतर त्याला सुकण्यासाठी 10 ते 12 सेकंद लागतात. मतदार एवढा वेळ संबंधित मतदान केंद्रावरच असतो. एकदा ही शाई वाळल्यानंतर ती कोणत्याही प्रकारे काढता येत नाही. ही शाई वेगळी नाही. भारतीय निवडणूक आयोग जी शाई वापरतो, तीच ही शाई आहे. एखादा मतदार मतदान केल्यानंतर पुन्हा मतदान केंद्रावर आला, तर तेथील निवडणूक अधिकारी निश्चितच त्याच्यावर कारवाई करतात. शाई पुसली जात असल्याविषयी केवळ संभ्रम निर्माण केला जात आहे. ही शाई 2011 पासून वापरली जात असल्यामुळे याच निवडणुकीत अशा प्रकारचा संभ्रम पसरवणे चुकीचे आहे. याशिवाय लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीतही अशा प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. पण शाई वाळल्यानंतर ती पुसली जात नाही, असे ते म्हणाले होते.
राज्यात आज अकोल्यासह 29 महापालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्यात एका प्रभागातील पेटी व त्यातील मतदान यंत्र बदलण्यात आल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराने केला आहे. या प्रकारामुळे मतमोजणी स्थळी काही काळ मोठा गोंधळ झाला. अकोला महापालिकेसाठी गुरुवारी निवडणूक झाली. त्यानंतर आज मतमोजणी सुरू झाली आहे. त्यात एका मतदान केंद्रावरील ईव्हीएमची पेटी व पेटीतील ईव्हीएम बदलण्यात आल्याचा संशय ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार शंकरराव भाऊराव लंगोटे यांनी हा आरोप केला आहे. ते म्हणाले, ईव्हीएम मशीनच्या वरच्या बॉक्सवर पंजाबराव काळे विद्यालय असा पत्ता आहे. तर आतील बॉक्सवर सरस्वती विद्यालयाचा पत्ता आहे. त्यामुळे यांनी सगळ्या मशीन्स बदलल्याचा संशय आहे. वरचे बॉक्स वेगळे आहेत. आत ईव्हीएम वेगळ्या आहेत. त्यामुळे मतमोजणी थांबवावी अशी माझी मागणी आहे. या लोकांनी (निवडणूक अधिकारी व सत्ताधारी) आमच्या प्रभागात मोठा घोळा केला. त्यात येथील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे येथील मतमोजणी थांबवावी. हे असे कसे राजकारण आहे? रात्री बेरात्री येऊन लोक इथे येऊन फिरत होते. ही पेटी आमच्यापुढे गेली होती. पण आता पेटी वेगळी व आतील मशीन वेगळी कशी झाली? असा सवालही लंगोटे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. एका उमेदवाराचे नाव 3-3 वेळा प्रभाग क्रमांक 14 च्या 34 नंबरच्या यादीत एका उमेदवाराचे नाव 3-3 वेळा टाकण्यात आले आहे. यात भाजपच्या उमेदवाराचा समावेश आहे. मी प्रत्यक्ष बूथवर बसलो होतो. मी ही यादीही पत्रकारांना देऊ शकतो, असेही ते यावेळी म्हणाले. दुसरीकडे, अकोला महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीत आज माजी महापौर विजय अग्रवाल यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे. तर प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसचे चारही उमेदवार दुसऱ्या फेरीअखेर आघाडीवर आहेत. या ठिकाणी सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस असा प्रमुख मुकाबला आहे. अकोल्यात यंदा 55.61 टक्के मतदान दरम्यान, अकोला महापालिका निवडणुकीमध्ये यावेळेस प्रथमच झोननिहाय 6 वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी केली जात आहे. निवडणुकीत 55.61 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का 0.30 टक्क्याने घसरला असून 9 वर्षांपूर्वी 55.91 मतदारांनी मतदान केले होते. अकोलेकरांचा कौल नेमका कुणाला? याचे चित्र दुपारनंतर स्पष्ट होईल. हे ही वाचा… संभाजीनगरात मतमोजणीस्थळी पोलिसांचा लाठीचार्ज:शिंदे गटाचे माजी महापौर विकास जैन जखमी, घेरून मारले; संजय शिरसाट यांचा संताप छत्रपती संभाजीनगर येथील मतमोजणी केंद्रावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यात सत्ताधारी शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन जखमी झालेत. त्यांच्या हाताला जबर मार लागला आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वाचा सविस्तर
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काल शांततेत मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र, निकालापूर्वीच निवडणूक आयोग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र टीका करत गंभीर आरोप केले आहेत. निकालाला काही तास उरले असताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमधून रोहित पवार यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, काही वेळातच मतमोजणी सुरू होणार असताना अद्याप मुंबईसह अनेक महानगरपालिकांमधील मतदानाची अंतिम आणि अधिकृत टक्केवारी जाहीर करण्यात आलेली नाही. हा प्रकार आजवर कधीही पाहायला मिळालेला नसल्याचे सांगत त्यांनी आयोगाच्या हेतूंवरच संशय व्यक्त केला आहे. महापौर कोणाचा बसवायचा, याचे गणित शेवटच्या क्षणी जुळवण्यासाठीच मतदानाची टक्केवारी जाहीर केली जात नाहीये ना? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. याचबरोबर निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आम्ही भाजपाची बी टीम आहोत, हे जाहीरच करावे, अशी उपरोधिक पण तीव्र टीकाही रोहित पवार यांनी केली आहे. काल मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान एकूणच शांततेत झाल्याचे चित्र असले, तरी मतदानाच्या टक्केवारीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता आहे. दुपारी 3.30 वाजेपर्यंत राज्यभरात अंदाजे 46 ते 50 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी वृत्तसंस्थेला दिली होती. मात्र त्यानंतरची अंतिम आकडेवारी वेळेवर जाहीर न झाल्याने संशयाची धार अधिक तीव्र झाली आहे. गुरुवारी पार पडलेल्या या महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकीकडे मतदान शांततेत झाले असले, तरी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगाच्या अनेक निर्णयांवर विरोधक आणि मतदारांकडून टीका होत आहे. या निवडणुकीत राज्यभरातील 2,869 नगरसेवकांच्या जागांसाठी 29 महानगरपालिकांमध्ये 15,931 उमेदवार रिंगणात होते. एवढ्या मोठ्या निवडणुकीत पारदर्शकता आणि विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची असताना, आयोगाकडून होत असलेली दिरंगाई संशयाला खतपाणी घालणारी ठरत आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणी प्रक्रियेवरूनही स्वतंत्र वाद निर्माण झाला आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत मतदार यादी, मतदान केंद्रांची रचना, 23 मतमोजणी केंद्रांची व्यवस्था आणि मतमोजणी प्रक्रियेत PADU या नव्या यंत्राचा बॅकअप म्हणून वापर केला जाणार असल्याची माहिती दिली होती. या यंत्राच्या वापरावर शिवसेना (ठाकरे गट) आणि आम आदमी पक्षाने आक्षेप नोंदवला आहे. राजकीय पक्षांना या यंत्राबाबत पुरेशी माहिती न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. PADU यंत्रावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेले नाही, त्याची माहिती दिलेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या नावाने आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. निवडणूक आयुक्त यावर उत्तर द्यायला तयार नाहीत, अशी टीका त्यांनी केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर, मतमोजणीच्या दिवशीच निवडणूक आयोगावर रोहित पवारांनी केलेले आरोप केवळ एका पोस्टपुरते मर्यादित न राहता, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित करणारे ठरत आहेत. निकालासोबतच आयोगाच्या भूमिकेकडेही आता राज्याचे लक्ष लागले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील मतमोजणी केंद्रावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यात सत्ताधारी शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन जखमी झालेत. त्यांच्या हाताला जबर मार लागला आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यात आज छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलामध्ये सत्ताधारी महायुती आघाडीवर असल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही 4 ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. या चारही ठिकाणी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व नागरिकांनी निकाल ऐकण्यासाठी गर्दी केली आहे. त्यातच उस्मानपुरा येथील शासकीय अभियांत्रिकी मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी तुफान लाठीमार केला. त्यात शिंदे गटाचे नेते तथा शहराचे माजी महापौर विकास जैन जबर जखमी झाले. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात पोलिस कर्मचारी नागरिकांना घेरून काठ्यांनी मारहाण करताना दिसून येत आहे. एक व्यक्ती पोलिसांच्या मारापासून वाचण्यासाठी झाडाजवळ बसला असताना पोलिस त्याच्यावरही काठ्यांचा प्रहार करताना दिसून येत आहेत. केवळ आत जाण्याच्या विनंतीवरून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. काय म्हणाले मंत्री संजय शिरसाट? संजय शिरसाट म्हणाले, आज मतमोजणी आहे. मतदान नाही. या लोकांना कळत कसे नाही. त्यांना काही सेन्स नाही का? जखमी झालेले कार्यकर्ते आमचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडे ओळखपत्र आहे. त्यांना जनावरासारखे मारले. यांना कसली मस्ती आहे. एक अधिकारी इथे दिसत नाही. यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. या पद्धतीने मारहाण होत असेल तर हा पोलिसांचा मस्तवालपणा आहे. ही मस्ती कुठे तरी उतरली पाहिजे. हे माजी महापौर आहेत. त्यांचा हात मोडला. ते मतदान करायला जात होते का? हा मतमोजणीचा टाईम आहे ना. ते पुढे म्हणाले, मतमोजणीसाठी सगळीकडे बॅरिकेड्स लावण्यात आलेत. सामान्य माणसांना प्रवेश नाही. असे असताना जे प्रतिनिधी आहेत, ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे, त्यांना आत जाण्यास तुम्ही मज्जाव का करता? ही कोणती मस्ती आहे तुमची? मतदान सुरू असते तर समजू शकतो आपण. पण हा बळाचा वापर हा मस्तवालपणा आहे. पत्रकारांनाही मारहाण झाली. हा सागर देशमुख नामक जो कोणता प्राणी आहे ना, त्याची मस्ती उतरली पाहिजे. त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी सीपींशी बोललो. सीपी तिकडून बोलतात की, माझे अधिकारी तिकडे आहेत. त्यांना स्पॉटवर यायला काय झाले? नेमकी परिस्थिती काय आहे हे ते इथे येऊन पाहू शकत नाहीत का? असा सवालही शिरसाट यांनी यावेळी उपस्थित केला.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे कृषीमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळणाऱ्या क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गोरेगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. १५ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडले आहे. वाशीम जिल्हयातील एका शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांसह विविध संघटनांमधून तिव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित कृषी अधिकाऱ्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी राज्यभर तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या शिवाय संघटनेचे संस्थापक रवीकांत तुपकर यांनीही या घटनेचा तिव्र निषेध केला असून या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून शासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असून अधिकाऱ्यांनाच पाठबळ दिले जात असल्याचा आरोप केला आहे. वाशीम जिल्हयातील शेतकऱ्यास मारहाण झालेल्या घटनेच्या निषेधार्थ गोरेगाव येथे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून या घटनेचा निषेध केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली. या प्रकरणानंतर जमादार भिकाजी मेनकुदळे यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषीमंत्र्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या् आरोपावरून संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, नामदेव पतंगे, प्रविण मते, सतीष इढोळे, बालाजी मोरे, सखाराम भाकरे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडले आहे. जमादार मैंदकर पुढील तपास करीत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कितीही गुन्हे झेलण्याची तयारी या संदर्भात संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यापुर्वीही केलेल्या आंदोलनात गुन्हे दाखल झाले आहेत. यापुढेही आंदोलन सुरुच राहणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कितीही गु्न्हे झेलण्याची आमची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान शहरातील वातावरण अनेक ठिकाणी अस्वस्थ करणारे ठरले. पैसे वाटपाचे आरोप, उमेदवाराच्या वाहनातून सापडल्याची चर्चा असलेली रोकड, कार्यकर्त्यांमधील झटापट आणि किरकोळ वाद अशा तेरा घटनांनी मतदानाच्या दिवशी नाशिकचे राजकारण तापले. मात्र, एवढ्या गदारोळानंतरही एकाही घटनेत गुन्हा दाखल न झाल्याने शहरभर चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून नाशिक पोलिसांकडून कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम जोरात राबवली जात असताना, निवडणुकीच्या दिवशी मात्र कारवाई का झाली नाही, असा सवाल नागरिक आणि राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. गुरुवारी (15 जानेवारी) नाशिक महानगरपालिकेच्या एकूण 1,563 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. काही भागांमध्ये मतदारांच्या रांगा उशिरापर्यंत कायम राहिल्या आणि रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. यंदा नाशिकमध्ये एकूण 56.76 टक्के मतदानाची नोंद झाली असून, 2017 च्या महापालिका निवडणुकीतील 61.60 टक्के मतदानाच्या तुलनेत जवळपास 5 टक्क्यांची घट झाली आहे. मतदानाचा टक्का घटलेला असला, तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय तापमान मात्र उच्च पातळीवर असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. मतदानाच्या दिवशी सिडको, नाशिकरोड आणि पंचवटी या भागांमध्ये विशेष तणावाचे प्रसंग पाहायला मिळाले. काही ठिकाणी मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप झाले, तर एका उमेदवाराच्या वाहनातून रोख रक्कम सापडल्याची चर्चा शहरात वेगाने पसरली. या घटनांमुळे संबंधित भागांमध्ये कार्यकर्ते आमनेसामने आले, घोषणाबाजी झाली आणि काही ठिकाणी किरकोळ झटापटही झाली. काही मतदान केंद्रांबाहेर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, ज्यामुळे मतदारांमध्येही अस्वस्थता पसरली. मात्र, या सर्व प्रकारांनंतरही कोणत्याही राजकीय पक्षाकडून किंवा नागरिकांकडून अधिकृत तक्रार दाखल न झाल्याचे कारण पुढे करून पोलिसांनी एकाही घटनेत गुन्हा नोंदवला नाही. नाशिक पोलिसांनी निवडणूक काळात कडक बंदोबस्त तैनात केला होता. संवेदनशील आणि अति-संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलिस कर्मचारी, गस्त पथके आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून सातत्याने नजर ठेवण्यात येत होती. शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. तरीही प्रत्यक्ष घटनांनंतर कारवाई न झाल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तक्रार नोंदवली नसली, तरी प्रत्यक्ष घडलेल्या घटनांकडे दुर्लक्ष करणे योग्य होते का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या निवडणुकीत नाशिक महानगरपालिकेतील 31 प्रभागांमधील एकूण 122 जागांसाठी 735 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये 527 उमेदवार विविध राजकीय पक्षांचे असून 208 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. 2017 च्या तुलनेत यंदा राजकीय चुरस अधिक तीव्र असल्याचे चित्र आहे. प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही जोरदार प्रचार केल्यामुळे निवडणुकीतील स्पर्धा अत्यंत काट्याची झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मतदानादरम्यान घडलेल्या घटनांकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. दरम्यान, आज होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पुन्हा एकदा कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अति-संवेदनशील भाग पोलिसांच्या विशेष रडारवर ठेवण्यात आले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून, पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे. निवडणूक निकालाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले जात आहे. नाशिकच्या राजकीय वातावरणात नवा वाद नाशिक महापालिकेत सत्तास्थापनेसाठी किमान 63 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला बहुमत मिळते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. मतदानादरम्यान घडलेल्या तणावपूर्ण घटनांप्रमाणेच निकालानंतरचे वातावरणही संवेदनशील ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे सत्तासंघर्ष तीव्र असताना, दुसरीकडे पोलिसांच्या कारवाईअभावी निर्माण झालेली चर्चा नाशिकच्या राजकीय वातावरणात नवा वाद निर्माण करत आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेचा निकाल काय लागणार, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, मतदान आणि मतमोजणीच्या गदारोळाआधीच काही महानगरपालिकांमध्ये निवडणुकीचा निकाल ठरला होता. कारण काही प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. या बिनविरोध निवडींमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजकीय वर्तुळात यावरून जोरदार चर्चा आणि वादही रंगले होते. राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये एकूण अनेक उमेदवार मतदान न होता थेट विजयी घोषित करण्यात आले. यामध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा विशेष उल्लेख करावा लागेल. कारण राज्यात सर्वाधिक बिनविरोध उमेदवार याच महानगरपालिकेतून निवडून आले आहेत. एका बाजूला लोकशाहीत जनतेचा कौल महत्त्वाचा मानला जात असताना, दुसऱ्या बाजूला एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारांचा बिनविरोध विजय होणे, हे अनेक प्रश्न निर्माण करणारे ठरले आहे. त्यामुळे खरंच ही लोकशाहीची प्रक्रिया आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत विविध प्रभागांतून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची यादी मोठी आहे. प्रभाग क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी यांच्यासह प्रभाग 24 (ब) मधून ज्योती पाटील, प्रभाग 18 (अ) मधून रेखा चौधरी, प्रभाग 26 (अ) मधून मुकंद तथा विशू पेडणेकर, प्रभाग 27 (ड) मधून महेश पाटील, प्रभाग 19 (क) मधून साई शेलार, प्रभाग 23 (अ) मधून दिपेश म्हात्रे, प्रभाग 23 (ड) मधून जयेश म्हात्रे, प्रभाग 23 (क) मधून हर्षदा भोईर, प्रभाग 19 (ब) मधून डॉ. सुनिता पाटील, प्रभाग 19 (अ) मधून पूजा म्हात्रे, प्रभाग 30 (अ) मधून रविना माळी, पॅनेल 27 (अ) मधून मंदा पाटील, पॅनेल 28 (अ) मधून हर्षल मोरे, तसेच प्रभाग 26 (क) मधून आसावरी नवरे आणि प्रभाग 26 (ब) मधून रंजना पेणकर यांचा समावेश आहे. याशिवाय राजन मराठे आणि रेश्मा निचल हे उमेदवारही बिनविरोध विजयी झाले आहेत. ठाणे महानगरपालिकेतही काही प्रभागांत उमेदवार बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्रमांक 14 (ड) मधून शितल ढमाले, प्रभाग 17 (ब) मधून राम रेपाळे, प्रभाग 18 (क) मधून जयश्री फाटक, प्रभाग 17 (अ) मधून एकता भोईर आणि प्रभाग 5 (अ) मधून सुलेखा चव्हाण यांची निवड बिनविरोध झाली. त्याचप्रमाणे भिवंडी महानगरपालिकेत प्रभाग 18 (अ) मधून अश्विनी सन्नी फुटाणकर, प्रभाग 18 (ब) मधून दीपा दीपक मढवी, प्रभाग 18 (क) मधून अबूसूद अशफाक अहमद शेख, प्रभाग 16 (अ) मधून परेश (राजू) चौघुले, प्रभाग 23 (ब) मधून भारती हनुमान चौधरी आणि वॉर्ड क्रमांक 17 (ब) मधून सुमीत पाटील हे उमेदवार थेट विजयी घोषित करण्यात आले. जळगाव महानगरपालिकेतही बिनविरोध निवडींची संख्या लक्षणीय आहे. प्रभाग क्रमांक 9 (अ) मधून मनोज चौधरी, 9 (ब) मधून प्रतिभा देशमुख, 12 (ब) मधून उज्वला बेंडाळे, प्रभाग 7 मधून विशाल भोळे, 16 (अ) मधून विरेंद्र खडके, 7 (अ) मधून दीपमाला काळे, 13 (क) मधून वैशाली पाटील, 7(ब) मधून अंकिता पाटील, 2 (अ) मधून सागर सोनवणे, 19 (अ) मधून रेखा पाटील, 19 (ब) मधून विक्रम सोनवणे आणि 18 (अ) मधून गौरव सोनवणे हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय अहिल्यानगर महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 11 मधून कुमारसिंह वाकळे आणि प्रभाग क्रमांक 14 मधून प्रकाश भागानगरे यांचा समावेश आहे. धुळे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 17 (ब) मधून सुरेखा उगले, प्रभाग 1 (अ) मधून उज्ज्वला भोसले आणि प्रभाग 6 (ब) मधून ज्योत्स्ना पाटील या उमेदवारांची निवड बिनविरोध झाली. पुणे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 35 (ड) मधून श्रीकांत जगताप आणि प्रभाग 35 मधून मंजुषा नागपुरे विजयी झाल्या. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रभाग 35 (ड) मधून श्रीकांत जगताप आणि प्रभाग 10 (ब) मधून सुप्रिया चांदगुडे यांचा बिनविरोध विजय झाला. राजकारणाची दिशा ठरवणारा निकाल पनवेल महानगरपालिकेतही अनेक प्रभागांत निवडणूक न होता निकाल लागला. प्रभाग 18 (ब) मधून नितीन पाटील, तसेच नितीन पाटील, रुचिता लोंढे, अजय बहिरा, दर्शना भोईर, प्रियंका कांडपिळे, ममता प्रितम म्हात्रे आणि स्नेहल ढमाले हे उमेदवार विविध प्रभागांतून बिनविरोध निवडून आले आहेत. या सर्व बिनविरोध निवडींमुळे आज जाहीर होणाऱ्या अंतिम निकालांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. एकीकडे मुंबईसारख्या महानगरपालिकेचा निकाल चुरशीचा ठरण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी आधीच ठरलेले निकाल लोकशाही प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे आजचा निकाल केवळ विजयी आणि पराभूत उमेदवारांची नावे जाहीर करणारा नसून, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे.
महापालिका निवडणुकीत मतदानाची वेळ सकाळी ७.३० ची.... पारा १५.२ मध्येही थंडीत मतदार सकाळी ७ वाजता पोहोचले... रांग लावली...मतदान सुरू होण्यापूर्वीच मतदान केंद्र परिसरात मतदार असल्याने व मतदानाची वेळ जवळ येत असल्याने मतदान प्रक्रियेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही लगबग वाढली झाली....अन् ७.३० ठोक्याला मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मतदान प्रक्रियेच्या निमित्ताने लोकशाही बळकट होण्याचे हे चित्र होते जुने शहरातील मतदान केंद्रातील. कोणी मॉर्निंग वॉकवरून थेट मतदान केंद्रात पोहोचले तर कुठे आईने सकाळीच चिमुकल्याला सोबत घेत मतदान केंद्र गाठले. अशातच हमजा प्लॉट परिसरात मतदान केंद्र स्थलांतरित झाल्यानंतर नवीन ठिकाणी मतदारांची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले.हिवाळ्यात तापमानाचा पारा कमी-जास्त होत आहे. एकदा तर १०.६ पारा अंश सेल्सिअसपर्यंत गेला होता. मात्र काही दिवसांपासून पारा १५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले. एकिकडे थंडी कमी जास्त होत असतानाच गुरुवारी मात्र मतदानाच्या दिवशी राजकीय वातावरण सकाळीच तापल्याचे जाणवले. डाबकी रोडवरील उजवणे कॉन्व्हेंटच्या केंद्रात रांगली लागली होती. झोन कार्यालय परिसरातील केंद्राबाहेर मात्र सकाळी फारशी गर्दी नव्हती. काही ठिकाणी मतदारांचा उत्साहाकडे पाहिल्यानंतर दिसून आले. कामगार कल्याण केंद्राच्याजवळ सकाळी फारसा निवडणुकीचा माहोल नव्हता. बाहेर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे बुथ, बाहेर पोलिस बंदोबस्त असे फार दिसून आले नाही. तरीही मतदार आतमध्ये असलेले केंद्र शोधत पोहोचत होते. प्रभाग पद्धतीनुसार झालेल्या मतदान प्रक्रियेत प्रत्येक प्रभागात भागात जागासाठी मतं द्यावी लागत होती. त्यामुळे एकही बटन न दाबल्यास मतदान पूर्ण होऊन बीप ऐकू येत नव्हते. उजवणे कॉन्व्हेंटमधील एका केंद्रात एका मतदाराने तीन बटनं दाबली. मात्र बीप ऐकून येत नव्हता. त्यामुळे मतदान अधिकाऱ्यांनी ज्या मशीनवरील बटन दाबल्या गेले नाही, तेथे तुम्हाला वाटते त्या चिन्हासमोरील बटन दाबा, असे सांगितले. त्यानंतर मतदाराने बटन दाबल्यानंतर बीप ऐकू आला व मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याने मतदाराच्या चेहऱ्यावरही समाधान पहावयास मिळाले. अबे आ जा; जल्दी होता : हमजा प्लॉट येथे शाह बाबू ज्यु. कॉलेजमध्ये प्रचंड गर्दी होती. समीर नामक युवक तेथे आला. त्याने तेथे असलेल्या मित्राकडे पाहून ‘इतने गर्दी में कौन खडा रहुंगा तो मेरे को मेरी तो दुकान बंद रखनी पडेगी|’ असे म्हणत त्याने तेथून मतदान न करता जवळपास परत जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याला अन्य मित्रांनी ‘थांब-थांब म्हणत लवकरच नंबर लागेल, आपण आताच मतदान करू, असे म्हणत रांगेत उभे करून घेतले. कामगार कल्याण केंद्राजवळच्या मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजताच अनेक मतदार पोहोचले. ‘एकदा सकाळी प्रथम मतदान केल्यानंतर दिवसभर अन्य कामे करण्यास आपण मोकळे असतो, असे त्यांचे म्हणणे होते. सकाळी १० नंतर गर्दी होते, असे आमचा यापूर्वीच्या मतदानाचा अनुभव असल्याने आम्ही सकाळी ७ पूर्वीच आलो’, असे काहींनी सांगितले. गुरुवार असल्याने शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी जायचे आहे. त्यामुळे सकाळीच मतदानासाठी आलो, असेही ते काहींनी सांगितले. पूर्वीच्या मनपा शाळा क्रमांक १बाहेर (आताचे मनपा पश्चिमचे झोन ऑफिस) सकाळी ७ मतदान दाखल झाले. मतदान हे कर्तव्य असून, यातून लोकशाही बळकट होऊन राष्ट्र आणखी सक्षम होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दोन-तीनऐवजी दोघांना सोडा मतदान केंद्रात टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात केंद्रात दोन-तीन जणांना सोडण्यात यावे, अशी सूचना मतदान अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. पोलिसही दोन जणांना आतमध्ये सोडत होते. एका व्यक्तीचे मतदान पूर्ण होण्यासाठी ५ ते ६ मिनिटे लागत होती. काही केंद्रांवर प्रचंड रांगा लागल्या होत्या. एका प्रभागात चार मतं अर्थात चार वेळा बटन दाबणे आवश्यक होते.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानाची आकडेवारी पाहता, यंदा मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांमध्ये लक्षणीय उत्साह दिसून आला आहे. दिवसभर संथ गतीने सुरू असलेली मतदान प्रक्रिया सायंकाळच्या सत्रात अचानक वेग घेताना दिसली. विशेषतः शेवटच्या दोन तासांत झालेली मतदानातील मोठी वाढ ही राजकीय पक्षांसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आकडेवारीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, दुपारी 3.30 वाजेपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 41.08 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर अवघ्या दोन तासांत म्हणजे सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी थेट 52.94 टक्क्यांपर्यंत पोहोचली. म्हणजेच शेवटच्या दोन तासांत 11.86 टक्के मतदान झाले. ही वाढ केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, तिचा थेट परिणाम निकालावर होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. मतदानाच्या वेगाचा विचार केला असता, दुपारी 3.30 वाजेपर्यंत मतदानाचा सरासरी वेग प्रति तास 5.13 टक्के इतका होता. मात्र, सायंकाळी 3.30 ते 5.30 या दोन तासांत हा वेग वाढून प्रति तास 5.93 टक्क्यांवर पोहोचला. या कालावधीत झालेली 11.86 टक्क्यांची वाढ ही स्पष्टपणे मतदारांच्या शेवटच्या सत्रातील सक्रियतेकडे निर्देश करते. मुंबईसारख्या महानगरात कामकाजानंतर मतदार मतदानासाठी बाहेर पडतात, हे चित्र यंदाही पुन्हा अधोरेखित झाले आहे. लिंगानुसार मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, दुपारी 3.30 वाजेपर्यंत पुरुष मतदारांचा सहभाग महिलांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. या वेळेपर्यंत पुरुष मतदारांचे मतदान 42.18 टक्के इतके होते, तर महिलांचे मतदान 39.83 टक्क्यांवर मर्यादित राहिले. ही तफावत जरी फार मोठी नसली, तरी मुंबईसारख्या शहरात महिला मतदारांचा सहभाग तुलनेने कमी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मात्र, शेवटच्या सत्रात ही दरी कितपत भरून निघाली, याकडेही राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. मुंबईमध्ये मतदानाच्या शेवटच्या सत्रात टक्केवारी वाढण्याची परंपरा नवी नाही. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीतही हा ट्रेंड कायम राहिल्याचे दिसून आले. शेवटच्या दोन तासांत झालेली 11.86 टक्क्यांची वाढ ही सामान्य वाढ मानली जात नसून, ती राजकीय समीकरणे बदलू शकणारी असल्याचे मानले जात आहे. काही प्रभागांमध्ये अत्यल्प फरकाने निकाल लागण्याची शक्यता असल्याने, हे शेवटच्या सत्रातील मतदान कोणाच्या पारड्यात झुकले, यावर अंतिम निकाल अवलंबून असणार आहे. या पार्श्वभूमीवर मागील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तुलना देखील महत्त्वाची ठरते. 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान झाले होते. मात्र, मतदान प्रक्रियेच्या शेवटच्या तासात म्हणजे सायंकाळी 5 ते 6आणि त्यानंतरही रांगेत उभ्या असलेल्या मतदारांमुळे मोठी वाढ झाली. अंतिम मतदानाची सरासरी थेट 66.05 टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. शेवटच्या टप्प्यातील मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता विधानसभा निवडणुकीतील शेवटच्या तासातील आकडेवारी पाहता, 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले होते, तर अंतिम एकूण मतदान 66.05 टक्के नोंदवले गेले. म्हणजेच शेवटच्या तासात 7.83 टक्क्यांची वाढ झाली होती. हाच अनुभव लक्षात घेता, मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही शेवटच्या टप्प्यातील मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आज जाहीर होणाऱ्या निकालात शेवटच्या तासांत मतदान करणाऱ्या मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने गेला, हेच मुंबईच्या सत्तेचा फैसला करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी काल, 15 जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली असून आज या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेचा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, अनेक एक्झिट पोल्समध्ये भाजप-शिवसेना महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर होणार का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार का, याबाबत चर्चा सुरू असतानाच भाजप नेते मोहित कंबोज यांनी मोठा दावा केला आहे. कायमच आपल्या आक्रमक वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत राहणाऱ्या कंबोज यांनी मुंबई पालिकेत भाजप ‘मॅजिक फिगर’ पार करेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सलग दोन पोस्ट करत भाजपच्या विजयाबाबत आपला अंदाज मांडला आहे. मोहित कंबोज यांनी आपल्या पहिल्या पोस्टमध्ये भाजप मुंबई महानगरपालिकेत 100 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. यानंतर त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये थेट आकड्यांकडे इशारा करत 110 कमळाची फुले आणि ‘अधिक’ असे चिन्ह वापरून सूचक संदेश दिला. या पोस्टमुळे भाजप मुंबईत 110 हून अधिक जागा जिंकणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कंबोज यांच्या दाव्यामुळे भाजप समर्थकांमध्ये उत्साह संचारला असून, विरोधक मात्र या अंदाजांवर संशय व्यक्त करत आहेत. मोहित कंबोज यांच्या या दाव्याला शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी कंबोज यांची पोस्ट शेअर करत त्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. क्रोनॉलॉजी समजून घ्या, असे म्हणत अखिल चित्रे यांनी एक संतप्त पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये भाजप निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतो, कंबोज निवडणुकीच्या काळात अमेरिकेत असतो, निवडणुकीआधी भारतात येतो, विजयाचे आकडे जाहीर करतो, त्यानंतर एक्झिट पोल्स येतात आणि तरीही सामान्य जनता चिंतेत असते, असा आरोप त्यांनी केला आहे. अखिल चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे जात, जर निवडणूक निकालात कंबोज यांनी दिलेले आकडे खरे ठरले आणि त्यामध्ये कंबोज : अमेरिका : ईव्हीएम : भाजप : अघोरी बहुमत यांचा परस्पर काहीही संबंध आढळला, तर महाराष्ट्राने तो केवळ योगायोग मानायचा का? असा सवाल उपस्थित केला आहे. या शब्दांतून त्यांनी अप्रत्यक्षपणे निवडणूक प्रक्रियेवर आणि ईव्हीएमवर संशय उपस्थित केल्याचे दिसून येते. या पोस्टमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निकालांवर मनसेकडूनही प्रतिक्रिया आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निवडणूक निकालांबाबत संयमित भूमिका मांडली आहे. आज मुंबई महानगरपालिकेचे निकाल आहेत. कोण जिंकेल आणि कोण हरेल, याचा निर्णय जनता करेलच, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी आपल्या सहकारी महाराष्ट्र सैनिकांचे कौतुक करत, ज्या हिमतीने माझ्या सहकारी महाराष्ट्र सैनिकांनी ही निवडणूक लढवली आणि मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन, असेही नमूद केले आहे. निकाल अत्यंत निर्णायक ठरणार एकीकडे भाजपकडून विजयाचे दावे, तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून तीव्र आरोप आणि मनसेकडून संयमाची भूमिका, अशा पार्श्वभूमीवर आज जाहीर होणारा मुंबई महानगरपालिकेचा निकाल अत्यंत निर्णायक ठरणार आहे. मुंबईच्या सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार, भाजपाचा पहिला महापौर होणार की शिवसेनेचे वर्चस्व कायम राहणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही तासांतच या सर्व प्रश्नांची उत्तरं समोर येणार असून, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राची नजर निकालाकडे लागली आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झाले असून तालुक्यातील शेलोडी गावातील लाभार्थी शेतकऱ्याला कृषी विभागाच्या तत्परतेमुळे अर्ज केल्यापासून २४ तासात अनुदान मिळाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. प्रकल्पा अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी यांचे अनुदान वाटप सुरू झाले असून शेगाव व खामगाव तालुक्यातील समाविष्ट असलेल्या पाणलोट समूहात समूह सहायक विजय भागवतकर कार्यरत आहेत. खामगाव तालुक्यातील शेलोडी गावातील शेतकरी भगवानसिंग शामसिंग पवार यांनी तुषार सिंचन या घटकाचा अर्ज ८ जानेवारी रोजी ग्राम विकास समिती शेलोडीकडे केला होता. योगायोगाने त्याच दिवशी ग्राम विकास कृषी समितीची सभा असल्यामुळे सदर अर्जास मान्यता देण्यात आली व सहाय्यक कृषी अधिकारी आसरा कांबळे या सभेस उपस्थित असल्यामुळे त्यांनी सदर अर्जावर त्यांनी त्याच दिवशी कार्यवाही केली. असता सदर अर्जास त्याच दिवशी खामगाव तालुका कृषी अधिकारी सुनील पवार यांनी पूर्वसंमती दिली. लाभार्थी भगवानसिंग पवार यांनी यांचे शेतात कांदा पिकाची लागवड केलेली असून त्यांना तुषार सिंचन संचाची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे त्यांनी त्याच दिवशी संचाची खरेदी केली व पाइपवर दुकानदार यांनी आंबोशिंग करून दिल्यामुळे ९ जानेवारी रोजी उपकृषी अधिकारी दीपक पाटेखेडे यांनी स्थळ पाहणी करून सकाळी १० वाजता लेखाधिकारी यांच्या डेस्क वर सदर प्रकरण अनुदान वर्ग करण्यासाठी वर्ग केले. प्रभारी लेखाधिकारी विजय खोंदिल यांनी कार्यवाही करून ११ वाजता प्रकरण उपविभागीय कृषी अधिकारी खामगाव यांच्या डेस्क वर वर्ग केले. १२ वाजता उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी सदर प्रकरण अनुदान वर्ग करण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी कार्यालय, मुंबई येथे सादर केले. प्रकल्प अंमलबजावणी कार्यालय, मुंबई यांनी सदर अर्जाची तपासणी करून याच दिवशी ९ जानेवारी रोजी संध्याकाळी अनुदान वर्ग केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ चा जिल्हा स्तरावरून वेळोवेळी घेतल्या जात असलेला आढावा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, मनोजकुमार ढगे, तसेच तंत्र अधिकारी रेणुका पाटील यांचे सहकार्य मिळाले.
लहान वयात विद्यार्थ्यांच्या आंतरिक सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन हे एक व्यासपीठ असून त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांची प्रतिभा पुढे येत असते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव सर्वप्रथम शालेय स्नेहसंमेलनातूनच मिळत असतो. असे प्रतिपादन श्रीराम मंदिर ट्रस्ट, कुंड सर्जापूर चे अध्यक्ष तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी केले. कुंड सर्जापूर येथील चंद्रभानजी विद्यालयाचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. त्यात उद्घाटकीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम मंदिर ट्रस्टचे सदस्य प्राचार्य गजानन इंगोले होते. यावेळी ट्रस्टचे सदस्य रमेशपंत बहाळे, वसंत मानकर, सुधिर कुकडे, संजय मानकर, चंद्रशेखर मानकर, अशोक मानकर, सत्कारमुर्ती व डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप बँकेचे संचालक अक्षय इंगोले, माजी मुख्याध्यापक आर.एस.गावंडे, रमेशपंत किटूकले व स्वागताध्यक्ष तथा चंद्रभानजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.टी.चव्हाण आदी उपस्थित होते. सर्वप्रथम दिप प्रज्वलन करून तसेच प्रभू श्री राम, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख, दानदाते स्व.चंद्रभान मानकर व विद्यालयाचे संस्थापक स्व.रावसाहेब इंगोले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तथा दिप प्रज्वलन करून या स्नेहसंमेनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर रांगोळी स्पर्धा, हस्त व पुष्प प्रदर्शनी, गणित कक्ष याचे उद्घाटन सुध्दा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अक्षय दिलीप इंगोले तसेच महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्र्ीमाई ुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले शाळेचे क्रीडा शिक्षक शरद गढीकर यांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सत्कारमुर्ती अक्षय इंगोले यांनी सत्काराला उत्तर देतांना ग्रामिण भाग असूनही शाळा ज्याप्रमाणे प्रगती करीत आहे त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून भविष्यातही शाळेने अशीच प्रगती कराव. असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी शरद गढीकर यांनी सुध्दा आपल्याला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे शाळेचा झालेला गौरव असून त्यासाठी सर्वांप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक एन.टी.चव्हाण यांनी शाळेच्या वर्षभरातील प्रगतीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे संचालन आर.एस.मानकर यांनी तर आभार स्नेहसंमेलन प्रभारी एस.पी.लाजूरकर यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीच्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अरुणा वाडेकर होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पालक व गावकरी मंडळीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी आयोजित विविध स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून कुंड सर्जापूरचे सरपंच निलेश मानकर, वनारसी गावाच्या सरपंचा ज्योत्स्ना संजयराव मोहोड, हातुर्णाचे सरपंच भरतरीनाथ गौरकर, हातुर्णा ग्रामपंचायतचे सदस्य भुषण वाणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक एन.टी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्नेहसंमेलन प्रभारी एस.पी. लाजूरकर, व्ही.के.राठोड, के.एस.लाजूकर, ए.पी.मांगे, आर.एस.मानकर, ए.व्ही. राजगुरे, शिक्षकेत्तर कर्मचारी सी.ए.शेंडे, आर.आर. मडावी यांच्यासह शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी, माजी विद्यार्थी, गावकरी मंडळी यांनी सहकार्य केले. दोन दिवसीय संमेलनात विद्यार्थ्यांचा जल्लोष दोन दिवसीय या स्नेहसंमेलनात विविध क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्तकला, चित्रकला व गणित विषयक मॉडेल, प्रश्नमंजूषा, अंताक्षरी स्पर्धा घेण्यात आल्या. तर सांस्कृतिक कार्यक्रमात या सर्व स्पर्धेचे तसेच शाळेच्या सन-२०२५-२६ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ३ व राज्यस्तरावरील ६४ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
बी.एड.चा अभ्यासक्रम हा केवळ पुस्तकी ज्ञान मिळवण्याचा काळ नसून तो खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक घडवण्याचा काळ असतो. शिक्षक साहित्य संमेलन विचारपीठ वैचारिक देवाण घेवाणीचा मोठा विचारमंच आहे. विद्यार्थांच्या सृजनशीलतेचा विकास येथे आलेल्या साहित्यिक शिक्षकांमधून होऊ शकतो. या संमेलनात सहभागी झालेले अनेक शिक्षक स्वतः लेखक, कवी, नाटककार आहेत. शिक्षक साहित्य संमेलन म्हणजे शिक्षकांमधून साहित्यिक घडविणारा विचारमंच आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.विनय राऊत यांनी केले. मातोश्री विमलाबाई देशमुख साहित्य नगरी श्री. शिवाजी शिक्षण महाविद्यालय येथे ९ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या समारोपीय आणि सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. समारोपीय सत्राच्या पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय प्राचार्य डॉ. विनय राऊत, प्रा.डॉ.गणेश चव्हाण, प्रा.डॉ.पृथ्वीराजसिं ह राजपूत, संघर्ष सावरकर, जयदीप सोनखासकर, प्रा.अरुण बुंदेले, शरदचंद्र बिडकर, प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे, प्रा.किशोर क्षत्रीय आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य राऊत पुढे ते म्हणाले की, या शिक्षक साहित्य संमेलनातील चर्चासत्रे, एकपात्री प्रयोग, मुक्त संवाद, कथा कथन, ग्रंथ दिंडी, परिसंवाद आणि कवी संमेलने हे सर्वच कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलेले आहेत. पूर्णपणे यशस्वी झाले, असे मला वाटते. असे विचार प्राचार्य डॉ. विनय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान मान्यवरांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन राज्याध्यक्ष जयदीप सोनखासकर, राजेंद्र भटकर, गजेंद्र पाथरे यांनी स्वागत केले. या सत्कार समारंभात लोकनेते, साहित्यिक, संपादक, निसर्गवासी भाई प्रभाकर सावरकर स्मृती राज्यस्तरीय शिक्षक साहित्यरत्न पुरस्कार प्रा.प्रतीक पाथरे, शिवा काळे देण्यात आला. तसेच अनेक गुणवंत मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. प्रमुख अतिथी संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ.गणेश चव्हाण, प्रा.डॉ. पृथ्वीराज सिंह राजपूत, संघर्ष सावरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शिक्षक साहित्य संघाचे राज्याध्यक्ष जयदीप सोनखासकर यांनी ठराव वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. मदा नांदुरकर, तर आभार सुरेश मडावी यांनी मानले.
सलग आयोजनाचे 13 वे वर्ष:स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तरुणांनी वर्षभरात मिळवल्या नोकऱ्या
तिवसा तालुक्यातील कुऱ्हा गावाला ‘माझं गाव, माझा उत्सव - कुऱ्हा महोत्सव’ मुळे वेगळी ओळख मिळाली आहे. गेल्या तेरा वर्षांपासून नियमितपणे हे आयोजन केले जाते. त्यासाठी शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी पुढाकार घेतात. यावर्षी २३ ते २५ जानेवारी दरम्यान कुऱ्ह्यात तेराव्यांदा हे आयोजन होत आहे. या महोत्सवामध्ये साहित्य, संस्कृती आणि क्रीडाविषयक उपक्रमांशिवाय गावातील प्रतीभांचा सन्मान केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अख्खे गाव सहभागी होते. त्यामुळे गावातील सामाजिक सौहार्द आणि राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यास मदत होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात बोलताना वाचनालयाचे ज्येष्ठ पदाधिकारी विवेक बिंड म्हणाले, हा उत्सव म्हणजे गावाची अस्मिता आहे. ती जपण्यासाठी आमची सतत धडपड सुरु असते. जमेची बाब अशी की गावकरी याला उत्स्फुर्त प्रतिसाद देतात. त्यामुळे आमचा उत्साहदेखील वाढतो. या उत्सवांतर्गतचा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम म्हणजे सामाजिक विषयावरील बौद्धीक आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून वर्षभरात नोकऱ्या मिळविलेल्या तरुण-तरुणींचा सत्कार हा आहे. त्यामुळे गावातील इतर तरुणांनाही प्रेरणा मिळते. पुढे त्यांचे अनुकरण करीत इतरही चांगला कित्ता गिरवतात, असे बिंड यांचे निरीक्षण आहे. याशिवाय बहुतेकांना लाभ घेता येईल, यासाठी तिर्था राजेश टेकाळे या चिमुकलीच्या स्मरणार्थ आरोग्य तपासणी शिबिरही भरवले जाते. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि नागरिकांदरम्यान रस्सीखेच स्पर्धादेखील घेतली जाते. कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये { हे गाव राजकीयदृष्ट्याही अत्यंत प्रगल्भ आहे. येथे डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही विचारांचा सन्मान करणारे लोकं राहतात. परंतु राजकीय मतभेद कधीही होऊ देत नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयापासून अंतर खेळ पैठणीचा हे असेल आकर्षण कुऱ्हा महोत्सवाच्या श्रृंखलेत यावर्षी एक नवे आकर्षण सहभागी करुन घेण्यात आले आहे. या आकर्षणाचे नाव ‘खेळ पैठणीचा’ असे आहे. कुऱ्हा येथील विवाहित मुली (ज्या महोत्सवादरम्यान सासरहून येथे येतात) व इतर महिला यामध्ये सहभागी होतील. या महोत्सवादरम्यान यावर्षी अधिक उत्पादन घेणारा शेतकरी आणि गावातील यशस्वी व्यवसायिक यांचाही सन्मान केला जाणार आहे.
अचलपूर नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्या महिला उपाध्यक्ष होण्याचा बहुमान काँग्रेसच्या खुर्शिदा बानो अताउल्ला शाह यांना प्राप्त झाला आहे. त्यांच्या रुपाने काँग्रेसच्या पारड्यात आणखी एक उप नगराध्यक्ष वाढला आहे. आज, गुरुवार, १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या गटनेता असलेल्या हेमा आसवान पराभूत झाल्या. नगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी दुपारी प्रारंभ झालेल्या पहिल्या बैठकीत ही निवड घोषित झाली. उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड हा या बैठकीचा अजेंडा होता. सदर प्रक्रिया पीठासीन सभापती नगराध्यक्ष रुपाली अभय माथने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सहायक अधिकारी व मुख्याधिकारी धीरज गोहाड यांनी पाहिले. अचलपूर नगर पालिकेच्या उपाध्यक्षांसाठी काँग्रेसच्या खुर्शिदा बानो अताउल्ला शा, भाजपच्या हेमा दिलीप आसवानी, प्रहार शहर विकास आघाडी पुरस्कृत अपक्ष विजय थावानी व राज पाटील यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. दरम्यान ठरलेल्या वेळेत विजय थावानी व राज पाटील यांनी आपले नामनिर्देशन मागे घेतल्याने दोनच उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पुढे हात उंचावून मतदान घेण्यात आले. काँग्रेसच्या खुर्शिदा बानो यांच्या बाजूने दीक्षित यांनी हात उंचावून पहिल्यांदा समर्थन केले. त्यांच्यासोबतच अपक्षांनी त्यांना समर्थन दिल्याने एकुण २३ मते त्यांच्या पारड्यात पडली. त्याचवेळी भाजप उमेदवार हेमा आसवानी यांच्या बाजूने नगराध्यक्ष रूपाली अभय माथने यांच्यासह १८ सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. अशाप्रकारे पीठासीन सभापतींनी काँग्रेसच्या खुर्शिदा बानो यांना विजयी घोषित करण्यात आले. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे एमआयएम, राष्ट्रवादी व अपक्षांचे गटनेता माजी नगराध्यक्ष ल. ज. दीक्षित यांनी शेवटपर्यंत आपल्या गटाला एकत्रीत बांधून ठेवले. विशेष म्हणजे काँग्रेस व दीक्षित यांच्या गटाला व्हीप काढण्याची गरज भासू दिली नाही. काँग्रेसच्या नगरसेवकाला उपाध्यक्षपदी विराजमान करण्यात त्यांनी अशाप्रकारे महत्वाचे योगदान दिले. तर दुसरीकडे भाजपच्या पाठीशी मनोज नंदवंशी यांच्या गटाने पूर्णपणे समर्थन दिले. भाजपने मात्र या निवडणुकीत व्हीप काढला होता. १८ सदस्यांचे हात उंचावून मतदान; विजयाचा मार्ग सुकर भाजपने व्हीप बजावला
विद्यार्थ्यानो तंत्रज्ञानाबरोबर बदलावेच लागणार आहे बदलत्या जगाबरोबर चालण्यासाठी काळानुरूप बदलणारे तंत्रज्ञान अवगत करा, नैतिक मुल्य व आई वडीलांचे संस्कार जतन करून काळानुरूप बदलण्याची आज गरज आहे असे लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसाचे संचालक अनिकेत आमटे यांनी सांगितले. आलमला येथील श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विश्वेश्वरय्या इंन्स्टिटयुट ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीेने घेण्यात आलेल्या हिवाळी परिक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. महाविद्यालयातुन 106 विद्यार्थी 90 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन ता 657 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या उल्लेखनिय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसाचे संचालक श्री अनिकेत आमटे यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, आनंदकुमार मिरगणे आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. आमटे यांनी हेमलकसा यासारख्या दुर्गम भागात चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. तसेच तेथील विद्यार्थ्यांना विनाशुल्क सेवा सुविधा देऊन तेथुन विद्यार्थी डॉक्टर करून अशाच दुर्गम भागातच सेवा देतील असा विश्वास बाळगुन विद्यार्थ्यांना बदलणारे नवनविन तंत्रज्ञान अवगत करण्यास सांगत असल्याचे सांगुन गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे यांनी बोलताना संस्थेत विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासासाठी राबविण्यात येणाया विविध उपक्रमाची माहिती दिली. या सत्कार सोहळयास गुणवंत विद्यार्थी व पालकांचा मोठा सहभाग लाभला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्थापत्य विभागातील रिया टेंकाळे, रोहन देशमुख, प्रणव जाधव, अदिती कदम या विद्यार्थ्यांनी तर आभार प्रा. अंकुश बिडवे यांनी केले.
महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी शहरात शांततेत मतदान झाले. महापालिका प्रशासनाकडून अंदाजे आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार दिवसभरात ३ लाख ७ हजार ९ पैकी १ लाख ९७ हजार ५५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सुमारे ६४.३५ टक्के मतदानाची नोंद झाली. सन २०१८ मध्ये ७३.१२ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा ८.७७ टक्के कमी मतदान झाले आहे. दरम्यान, दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४८.४९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर अखेरच्या दोन तासात झालेले १५.८६ टक्के मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत अवघे २० टक्केच मतदान झाले. सुरुवातीला निरुत्साह दिसून आला. बहुतांश प्रभागात दुपारनंतर नागरिक मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे साडेतीन वाजेपर्यंत मतदानाचा टक्का २८ टक्क्यांनी वाढला. बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. अखेरच्या दोन तासातही मतदानासाठी मोठा उत्साह दिसून आला. मात्र, मागील निवडणुकीच्या तुलनेत निवडणुकीबाबत उत्साह कमी असल्याने मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात घडल्याचे चित्र आहे. दरम्यान, राधाबाई काळे महाविद्यालय, आयकॉन पब्लिक स्कूल, पेमराज सारडा महाविद्यालय येथील मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सर्वात शेवटी पावणेसात वाजता राधाबाई काळे महाविद्यालयातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. मनपा निवडणुकीसाठी प्रभाग क्र. ५, ९, १०,१३ या चार प्रभागांत पुरुषांपेक्षा महिला मतदार आघाडीवर राहिल्या. प्रभाग क्रमांक ५ मध्ये ८ हजार १७९ महिला मतदारांनी तर ७८१८ पुरुषांनी मतदान केले. यात पुरुषांपेक्षा ३६१ महिला मतदार अधिक होत्या. प्रभाग क्र. ९ मध्ये ८५५१ महिलांनी, तर ८४९६ पुरुषांनी मतदान केले. येथे पुरुषांच्या तुलनेत ५५ महिला मतदार अधिक होत्या. तर प्रभाग क्र. १० व १३ मध्ये अनुक्रमे ४६ व ३७ महिला मतदार जास्त होते. प्रभाग १० मध्ये महिला मतदार १० हजार ९०३, पुरुष मतदार १० हजार ८५७, प्रभाग १३ मध्ये ७८८० महिला, तर ७८४३ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यंदाच्या निवडणुकीतील अर्थकारणावरून दिवसभर मतदार व नागरिकांमध्ये चर्चा रंगल्या होत्या. मध्य शहरासह केडगाव, मुकुंदनगर सावेडी उपनगरातील विविध भागात हॉटेल्स, उपहारगृहे, चौकांमध्ये उमेदवारांनी मतदारांना घडवलेले लक्ष्मीदर्शन व काही प्रभागात अर्थकारणाने गाठलेला उच्चांक सर्वसामान्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू होता. सर्वाधिक सुशिक्षित मतदार असलेल्या सावेडीतील प्रभागातही अखेरच्या टप्यात लक्ष्मीदर्शन घडवण्याची वेळ आल्याने हाही चर्चेचा विषय ठरला. महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी आयकॉन शाळेत मतदानासाठी मतदारांची लागलेली रांग. छाया : सिद्धार्थ दिक्षित. दिवसभर असे झाले मतदान { सकाळी ७.३० ते ९.३० : ७.८७ टक्के { सकाळी ९.३० ते ११.३० : २०.१६ टक्के { सकाळी ११.३० ते १.३० : ३३.९१ टक्के { दुपारी १.३० ते ३.३० : ४८.४९ टक्के { दुपारी ३.३० ते ५.३० : ६४.३५ टक्के मध्य शहर, केडगाव, मुकुंदनगर येथील प्रभाग वगळता इतर प्रभागांमध्ये परस्परविरोधी सक्षम उमेदवार नसल्याने मतदारांमध्येही निरुत्साह दिसून आला. विशेषतः दोन जागा बिनविरोध झालेल्या प्रभागात सर्वात कमी ५७ टक्के मतदान झाले. इतरही प्रभागांमध्ये विद्यमान नगरसेवक किंवा सक्षम असलेल्या उमेदवारांच्या तुलनेत विरोधी उमेदवार सक्षम नसल्याने मतदारांना मतदानासाठी सक्षम पर्याय नसल्याच्या चर्चा या प्रभागांमध्ये रंगल्या होत्या. त्यातूनच अनेक प्रभागात कमी मतदान झाल्याचे बोलले जात आहे. प्रभागनिहाय मतदान व अंदाजे टक्केवारी प्रभाग १ - १४५३४ (६५.८०%), प्रभाग २ - १२१८४ (५६.६४%), प्रभाग ३ - ८४७४ (५८.३३%), प्रभाग ४ - १३२८७ (६९ %), प्रभाग ५ - १०२९६ (६३.९९%), प्रभाग ६ - ९७७६ (५७%), प्रभाग ७ - १०२०४ (६४%), प्रभाग ८ - १३५१५ (७५%), प्रभाग ९ - ११२६६ (६६.०८%), प्रभाग १० - १५.२८ (६९.०६%), प्रभाग ११ - १२३१७ (५९.३०%), प्रभाग १२ - ११५६९ (६०%), प्रभाग १३ - ९७४८ (६२%), प्रभाग १४ - १०७२३ (६३%), प्रभाग १५ - ११३५४ (६८.१७%), प्रभाग १६ - १३१०० (६९.४१%), प्रभाग १७ - १०१८० (६६.५९%).
एकाच व्यक्तीकडून 31 मतदार कार्ड जप्त:तिघांवर गुन्हा दाखल, आनंद शाळेत बोगसमतदान, सेनेचा आरोप
सावेडीच्या गुलमोहोर रोडवरील आनंद शाळेजवळ मनपा निवडणुकीच्या मतदानासाठी आलेल्या दोघा जणांना शिवसेनेच्या उमेदवाराने पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच, जवळच असलेल्या पारिजात चौकातून एका व्यक्तीकडून ३१ मतदार कार्ड शिवसेनेच्या कार्यकर्त्याने काढून घेतले. यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी मतदार कार्ड जप्त करून दोघांना ताब्यात घेतले. शिवसेना उमेदवार चंद्रकांत उर्फ काका शेळके यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश कुंडलीक शेकडे (वय ३४, रा. म्हसोबाची वाडी, ता. आष्टी, जि. बीड) व सतीश नवनाथ शेकडे (रा. म्हसोबाची वाडी, ता. आष्टी, जि. बीड) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद शाळेत मतदान उत्साहात सुरू असताना मतदानासाठी आलेल्या दोघांना शिवसेना उमेदवाराने हटकले. त्यांना पत्ता विचारला असता मतदाराला तो सांगता आला नाही. तसेच, जवळच चौकातून एका अनोळखी व्यक्तीकडून मतदार कार्ड हिसकावून घेण्यात आले. त्याला पकडण्याच्या आतच तो पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गावाच्या विकासात सहकार्यासाठी श्रमसंस्कार शिबिरांची आज गरज
सध्याची तरुण पिढी सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेली आहे, त्यांच्या मन व मेंदूला बळकटी मिळायला हवी. गावाच्या विकासात सहकार्य करण्यासाठी श्रमसंस्कार शिबिरे असतात. वृक्ष कायम दात्याची भूमिका निभावत असतात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे या विंदा करंदीकर यांच्या कवितेचा दाखला देऊन तरुणाईने समाजासाठी उतराई होण्याचे याप्रसंगी आवाहन केले. युवा पिढीकडून समाजाची खूप मोठी अपेक्षा आहे. युवा पिढीने ठरवले तर गावाचाच नव्हे तर देशाचा सुद्धा चेहरामोहरा बदलू शकतो, असा विश्वास दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी व्यक्त केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर १५ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत कर्जत तालुक्यातील पठारवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य संजय नगरकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पठारवाडीचे ग्रामस्थ मोहन शिंदे तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब धांडे, पठारवाडी गावचे सरपंच शरद यादव, नितीन तोरडमल, विजूकाका तोरडमल आदी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात मोहन शिंदे यांनी एनएसएस शिबिरार्थींना पठारवाडी गावाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. युवा पिढीचा आमच्या गावासाठी मोठा हातभार लागणार असल्याचा आनंद त्यांनी याप्रसंगी व्यक्त करून महाविद्यालय राबवित असलेल्या शिबिराबद्दल धन्यवाद व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास भोसले यांनी तर आभार डॉ. कैलास रोडगे यांनी मानले.
विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च आळे या महाविद्यालयांचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन बाळेश्वर शिक्षण व शेती विकास संस्थेचे संस्थापक डॉ. शिवाजीराव पोखरकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांच्या नृत्य, गायन, एकपात्री अभिनय, नाटक, फॅशन शो अशा रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. ११ ते १३ डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या विविध क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करताना प्रमुख पाहुणे म्हणून मनोज हाडवळे व कुलदीप मोरे उपस्थित होते. ३ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या पुष्प सजावट स्पर्धेने कार्यक्रमाला वेगळीच कलात्मक उंची दिली. यावेळी प्रसिद्ध हास्य कलाकार दिव्येश शिरवडकर यांच्या विनोदी सादरीकरणाने सभागृहात हास्याची लाट उसळली. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, उपाध्यक्ष दिनेश पाडेकर, सचिव विजय पारखे, खजिनदार शिवाजीराव बांगर, संचालक लक्ष्मण कोरडे, महेंद्र शिंदे, विक्रांत काळे, माजी अध्यक्ष अशोक सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दुष्यंत गायकवाड, प्राचार्य डॉ. सुरेश जाधव, प्राचार्या डॉ. रूपाली हांडे आदी उपस्थित होते. प्राचार्या डॉ. रूपाली हांडे यांनी महाविद्यालयाचा वार्षिक शैक्षणिक अहवाल सादर केला तर संचालक लक्ष्मण कोरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘विशाल फार्मोत्सव २०२५-२६’ ची जनरल चॅम्पियनशीप जी. बी. फार्मसी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पटकावत उपस्थितांकडून दाद मिळवली. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. तर उर्वरित सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाचा रंग अधिक गडद केला. महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाला नागरिकांचीही उपस्थिती होती. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, एकपात्री अभिनय, नाटक, फॅशन शो असे विविध कलाविष्काराचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सादरीकरणाला मिळाली दाद दरम्यान, महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाला नागरिकांचीही उपस्थिती होती. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, एकपात्री अभिनय, नाटक, फॅशन शो असे विविध कलाविष्काराचे सादरीकरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी समाजाशी जोडले जावे:हीच रासेयो'ची खरी भावना: फराटे
श्रम आणि संस्कार हे दोन शब्द आपल्या जीवनाचा पाया आहेत. विद्यार्थ्यांनी समाजाशी जोडले जावे, हीच राष्ट्रीय सेवा योजनेची खरी भावना आहे, असे प्रतिपादन संस्थेच्या सचिव मृणाल फराटे पाटील यांनी केले. फराटे कॉलेज ऑफ फार्मसी, निर्वी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित सात दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ निर्वी येथे उत्साहात पार पडला. याप्रसंगी संस्थेच्या सचिव फराटे पाटील बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन सुरेखा बंडू सोनवणे होत्या. कार्यक्रमास माजी सरपंच तात्यासाहेब सोनवणे, विद्यमान सरपंच भाग्यश्री बुऱ्हाडे, माजी सरपंच मनीषा पवार, उपसरपंच प्रियंका माळवदकर, माजी उपसरपंच निलेश सोनवणे, तसेच ग्रामपंचायत सदस्य, प्राचार्य डॉ. हेमंत कांबळे, प्राचार्य प्रवीण कुरुमकर, प्राचार्य डॉ. विवेक सातपुते, प्राचार्य संदीप कोकरे प्रा. अहिवाळे, कार्यक्रम अधिकारी जयराम पवार, ऋषिकेश पवार, विशाल चव्हाण, वृषाली शेलार, सुप्रिया वागस्कर, इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरादरम्यान ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, झाडांना रंगरंगोटी, प्रभातफेरी, पथनाट्य, मेडिकल कॅम्प तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्रामविकासाची जाणीव, सामाजिक भान, शिस्त व कष्टाचे महत्त्व रुजल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. समारोपावेळी स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत शिबिरातील अनुभव कथन केले व ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमळ आदरातिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. रमेश शितोळे यांनी, तर आभार प्रा. जयराम पवार यांनी मानले.
मकर संक्रांतीला पतंगप्रेमींनी आनंदोत्सव साजरा करून, ‘काटा, काटी’ स्पर्धेचा थरार अनुभवला. पण काही पतंगप्रेमींनी बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर केल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत झाडांवर तसेच वीजवाहक तारांवर मांजा व पतंग लटकलेले आहेत. या मांजांत अडकून दोन सराटी जातीचे पक्ष्याचा मृत्यू झाला आहे. तसेच एक घुबड सतर्कतेमुळे बचावले. 'नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल'ने (एनजीटी) नायलॉन किंवा काचयुक्त (सिंथेटिक) मांजाच्या विक्री, उत्पादन आणि वापरावर बंदी घातली आहे. परंतू, या माजांच्या नियंत्रणासाठी पोलिस प्रशासन वगळता वनविभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठोस पावले उचलली नाहीत. दरवर्षी या मांजामुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर येतात. यंदाही शहरात मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या मांजाचा वापर करण्यात आला. काटाकाटीच्या स्पर्धेत कटलेल्या पतंगाबरोबर, आलेला मांजा वीजवाहक तारा, तसेच झाडांमध्ये अडकला आहे. आकाशात मुक्त भरारी घेणाऱ्या पाखरांना तसेच झाडावर बसलेल्या पाखरांनाही इजा पोहोचली आहे. नेचर लव्हर्स क्लब, अहिल्या नगर बर्डिंग पाल्स व अहिल्या नगर बर्ड रेस्कयू सेंटर, आरण्य फाउंडेशन व नगर ट्रेकर्सने मांजामुळे जखमी पक्ष्यांवर उपचार करणे व बचावासाठी प्रयत्न सुरू केले. मंदार साबळे, जिल्हा मानद वन्यजीव रक्षक. अन्नसाखळीला बाधा, मनपाने मोहीम घ्यावी अन्नसाखळी पक्ष्यांचे स्थान महत्त्वपूर्ण असून, ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत. पिकांना हानिकारक किटक, अळ्यांना पक्षी खाऊन, नियंत्रणात ठेवतात. दुर्दैवाने बंदी असूनही मांजाचा वापर वाढल्याने पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. मनपाने तातडीने शहरभरातील विजेच्या तारा व झाडावर अडकलेला मांजा काढण्याची मोहीम हाती घ्यावी, तशी मागणी मी आयुक्तांकडे करणार आहे. झाडावरच्या मांजात घुबडाचे पाय, पंख अडकले ^ धर्माधिकारी मळा येथे कढीपत्त्याच्या झाडांत अडकलेल्या मांजात एक घुबड अडकून जखमी झाले. या मांजाच्या गुंत्यात त्याचे पाय व पंख अडकले होते. काही वेळाने निसर्ग मित्र येथे आले. त्यांनी घुबडाची मांजातून सुटका केली. पण त्यात घुबड जखमी झाले. या मांजावर बंदी असायला हवी. विशाल फणसे, प्रत्यक्षदर्शी.
शहरातील गणेशोत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध व कलात्मक व्हावा या उद्देशाने कै. बळवंत विष्णू विसपुते सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य गणेश आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमुळे शहरातील गणेश मंडळांमध्ये सर्जनशीलता, सांस्कृतिक जतन व पर्यावरणपूरक सजावटीला चालना मिळाली असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ग्रामीण उन्नती मंडळ, एरंडोलतर्फे चालवण्यात येणाऱ्या विसपुते सार्वजनिक वाचनालयाच्या पुढाकाराने आयोजित या स्पर्धेत शहरातील विविध गणेश मंडळांनी अत्यंत आकर्षक, कल्पक व कलात्मक देखावे सादर केले. उत्कृष्ट गणपती आरास सादर करणाऱ्या मंडळांमधून प्रथम क्रमांक श्रीराम गणेश मंडळ, द्वितीय क्रमांक सर्वोदय गणेश मंडळ तर तृतीय क्रमांक नम्रता गणेश मंडळ यांनी पटकावला. विजेत्या मंडळांना ढालीच्या स्वरूपात आकर्षक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमुळे गणेशोत्सव केवळ उत्सव न राहता सामाजिक प्रबोधन, पर्यावरण संवर्धन व कलात्मक अभिव्यक्तीचे माध्यम ठरत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सचिन विसपुते, सचिव अंजुषा विसपुते, नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, नगरसेवक मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी गणेश मंडळांच्या उपक्रमांचे कौतुक केले. अशा स्पर्धा सामाजिक सलोखा व सांस्कृतिक परंपरेच्या जतनासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. या स्पर्धेचे परीक्षण अमोल वाणी, एस. एस. पाटील, आनंद ठाकूर यांनी केले. तर ग्रामीण उन्नती मंडळ व सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सर्व सहभागी गणेश मंडळे, परीक्षक व नागरिकांचे आभार मानण्यात आले.
तालुक्याची ‘लाईफ लाईन’ समजले जाणारे अंजनी धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही एरंडोल शहरातील नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ वितरण व्यवस्थेतील त्रुटी, नियोजनाचा अभाव आणि तांत्रिक अडचणींमुळे शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. काही भागांत तर हा पुरवठा सात ते आठ दिवसांपर्यंत लांबणीवर पडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील पाणीपुरवठा करताना काही भागांमध्ये ठराविक वेळेत नळाला पाणी सोडले जाते; मात्र अनेक वसाहतींमध्ये नेहमीच उशिरा अथवा अत्यल्प दाबाने पाणी येते. परिणामी नागरिकांना टँकर, खासगी बोअरवेल किंवा साठवणुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक तीव्र होत असून, महिलांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. अंजनी धरण भरलेले असताना तहान सहन करणे अन्यायकारक असून, पाणी वितरण व्यवस्थेतील उणिवा दूर करून एरंडोलकरांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, अशी मागणी आता स्थानिकां डून केली जात आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. शहरातील पाणी वितरण प्रणालीचा तातडीने आढावा घेऊन झोननिहाय समान व नियमित पाणीपुरवठा, गळती रोखण्यासाठी पाइपलाइन दुरुस्ती, वेळापत्रक जाहीर करणे आणि तांत्रिक अडचणींवर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. योग्य नियोजनाचा अभाव हीच खरी समस्या पाण्याची कमतरता नसून हे व्यवस्थेचे अपयश आहे, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. जुनी व जीर्ण पाईपलाईन, अपुर्ण दाब, विभागनिहाय नियोजनाचा अभाव, गळती आणि देखभालीकडे होणारे दुर्लक्ष ही या समस्येची प्रमुख कारणे असल्याचे जाणकारांचे मत आहे. ^धरण पूर्ण क्षमतेने भरते तरीसुद्धा शहरातील पाणीपुरवठा काही भागांमध्ये विशेष करून जहांगीर पुरा भागातील गणपती मंदिर, श्रीराम चौक भागातील पाणीपुरवठा हा कधीही वेळेवर होत नाही. व त्याविषयी माहिती दिले जात नाही तरी हे तात्काळ थांबवावे. - प्रदीप महाजन, सामाजिक कार्यकर्ते, एरंडोल
येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंगेश शिरोळे यांची गुरुवारी अविरोध निवड करण्यात आली. तर स्विकृत नगरसेवकपदाच्या २ जागांसाठी ५ जणांचे अर्ज आले होते मात्र अर्जात त्रुटी असल्यामुळे पाचही जणांचे अर्ज बाद झाले. दरम्यान, उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत मंगेश शिरोळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यावर सुचक म्हणून राजेंद्र जावरे यांनी तर अनुमोदक म्हणून आशा भडांगे यांनी सही केली होती. यावेळी नगरपरिषदेच्या सभागृहात नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सभा पार पडली. व्यासपिठावर नगराध्यक्षा शालिनी खातळे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते फिरोज पठाण उपस्थित होते. या प्रसंगी सभागृहात सर्व नगरसेवक व नगरसेविका यांच्यासह शिवसेनेचे युवानेते संजय खातळे, शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष वसीम सैय्यद आदी उपस्थित होते.उपनगराध्यक्ष यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर मंगेश शिरोळे यांच्या समर्थकांनी सभागृहाच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. उपनगराध्यपदी मंगेश शिरोळे यांची अविरोध निवड झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना पदाधिकारी
शहरातील सर्वे नंबर ९३ येथे तुटलेली पतंग पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या बालकाच्या हाताच्या करंगळीला नायलॉन मांजामुळे गंभीर दुखापत झाली आहे. जवळपास १२ टाके पडले. शिवाय आनंद वर्मा (८) याने तुटलेली पतंग पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला नायलॉन मांजा असल्यामुळे डाव्या हाताची करंगळीला गंभीर दुखापत झाली. शिवाय वर्मा याला तातडीने कातकडे हॉस्पिटल येथे नेण्यात आले. १२ टाके टाकून करंगळी जोडण्यात आली. तर बुधवारी लासलगाव आणि विंचूर येथे दोन घटनांमध्ये शेतकरी गंभीर जखमी झालेले आहेत. प्रतिनिधी | लासलगाव पतंगांसाठी नायलॉन मांजा वापरण्यास बंदी असताना देखील सर्रासपणे नायलॉन मांजा वापरल्याने येथे मांजामध्ये अडकून घुबड गंभीर जखमी झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते व पक्षीमित्र पंकज आब्बड यांनी या अडकलेल्या घुबडाची सुटका करून त्याच्यावर उपचार केले आहे. शहरात मकर संक्रांतीच्या दिवशी कोटमगाव येथील शेतकरी गळ्यामध्ये मांजा अडकल्याने गंभीर जखमी झाले होते. हे प्रकरण ताजे असताना गुरुवारी किल्ल्यामध्ये असलेल्या एका झाडावर नायलॉन मांजामध्ये घुबड अडकून मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते. याच परिसरात वास्तव्यास असलेले पंकज आब्बड यांनी शेर मोहम्मद रंगरेज, राजेश आब्बड यांनी जवळपास एक तास अथक परिश्रम करत या घुबडाची सुटका केली. घुबडाच्या पंखांना मोठ्या प्रमाणात जखम झालेली आहे. गंभीर जखमी झालेल्या घुबडाला लासलगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन त्यावर उपचार करण्यात आले. एक दिवस उपचार करून उडण्या योग्य झाल्यास त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे, किंवा उडता न आल्यास वनविभागाच्या ताब्यात दिले जाणार आहे.
दिंडोरी तालुक्यातील करंजी (आंबेवणी) हे कर्दमऋषींच्या आश्रमामुळे आणि दत्तात्रेय प्रभूंचे आजोळ म्हणून ओळखले जाणारे आध्यात्मिक व निसर्गरम्य गाव आहे. श्री क्षेत्र करंजी हे कर्दमऋषी व दत्तात्रेय प्रभूंच्या माहात्म्यामुळे भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, दंडकारण्यात ज्या भागात कर्दमऋषींनी तपश्चर्या केली त्या परिसरात करंजीची झाडे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे या परिसराला करंजी हे नाव पडले, तर आश्रम कर्दमाश्रम म्हणून ओळखला जाऊ लागला.दत्तात्रेय प्रभूंचे आजोळ म्हणून हा परिसर पुरातन काळापासून गाव करंजी (आंबे वणी) जगातील एकमेव पद्मासन स्थित स्वयंभू श्री दत्तात्रेय मूर्ती व श्री क्षेत्र करंजी येथील मंदिर करंजी (आंबेवणी) हे कर्दमऋषींचा आश्रम असलेले गाव आहे. दत्तात्रेय प्रभूंचे आजोळ म्हणून या क्षेत्राला विशेष महत्त्व आहे. येथे पद्मासनातील त्रिमुखी दत्तमूर्ती असून गंगास्थान व घाट भाविकांचे मुख्य आकर्षण आहे. दत्त जयंती आणि महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनासाठी येतात. परिचित आहे. दशनाम जुना आखाड्यातील साधू-महंत कुंभमेळ्याच्या काळात येथे वास्तव्यास येतात. कर्दमाश्रमात काशीची गंगा अवतरल्याची श्रद्धा असून पर्वणीच्या काळात हजारो भाविक गंगामाईत स्नानासाठी येथे येतात. त्यामुळे या क्षेत्राला प्रतिगाणगापूर असेही म्हटले जाते. करंजी येथे दत्तात्रेय प्रभूंची पद्मासनातील त्रिमुखी मूर्ती आहे. दत्तप्रभूंनी आपल्या आजोळी ज्ञानसाधना केल्यामुळे ही मूर्ती पद्मासनात असल्याचे सांगितले जाते. येथे स्वामी शिवदयाळ गिरी व रामचंद्र महाराज यांच्या समाधी आहेत. देवस्थानतर्फे विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, भाविकांसाठी भक्तनिवास, गोशाळा चालविली जाते. दत्त जयंती व महाशिवरात्रीला भाविकांची गर्दी होते.
भावाने मारहाण केल्याने सिल्लोडमध्ये आत्महत्या:मृताच्या पत्नीची फिर्याद, चौघांवर गुन्हा दाखल
शेतीच्या व सामायिक विहिरीवरून पाणी भरण्याच्या कारणावरून शारीरिक मानसिक छळ करून वेळोवेळी मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून चौघांच्या विरोधात सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार राजू दुल्लत यांनी दिली. मृत संजय तानाजी दुधे यांची पत्नी रेखा दुधे यांनी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले की, त्या व त्यांचे पती शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. मागील सहा ते सात वर्षांपासून त्यांचे दीर राजू तानाजी दुधे व त्यांचे तीन मुले हे त्यांना व त्यांच्या पतीला नेहमी शेतीच्या व विहिरीवरून पाणी भरण्याच्या कारणावरून मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत असत. अशाच धमकीसह बुधवारी (दि. १४) त्यांच्या पतीस त्यांचा दीर राजू तानाजी दुधे, त्याची पत्नी लता, मुले संदीप व राजू यांनी मारहाण केली. त्यानंतर घरी आल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या त्रासाला कंटाळून संजय दुधे यांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली, अशा आशयाच्या तक्रारीवरून वरील चौघांच्या विरोधात संजय दुधे यांना आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे करीत आहेत. चारही आरोपी फरार या प्रकरणामधील संशयित चारही आरोपी फरार आहेत. या चौघांचाही पोलिस शोध घेत आहेत, रात्री उशिरापर्यंत कुणालाही अटक झाली नव्हती, अशी माहिती पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी दिली. मृतावर रात्री उशिरा सिल्लोडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
हार्वेस्टरमुळे आळंदला एकरभर तुरीचे खळे तासाभरात; मनुष्यबळावर तोडगा
फुलंब्री तालुक्यातील आळंद परिसरात यंदा खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर तुरीची लागवड झाली. सध्या तूर काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. यंदा शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी हार्वेस्टर यंत्राचा वापर करत आहेत. यामुळे वेळेची बचत होत आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने तुरीचे पीक जोमात आले. मात्र, काढणीच्या वेळी मजुरांची टंचाई जाणवत आहे. पूर्वी तूर कापल्यानंतर ती खळ्यावर आणून काठ्यांनी बडवून किंवा बैलांच्या साहाय्याने मळणी केली जात होती. या प्रक्रियेला वेळ आणि मेहनत अधिक लागत होती.
गंगापूर तालुक्यातील आराध्यदैवत असलेल्या श्रीक्षेत्र गवळी शिवरा गावातील स्वयंभू असलेल्या महारुद्र मारुती मंदिराची आख्यायिका पुरातन काळापासून चालत आलेली आहे. येथे अखंडित दररोज सकाळी सहाला आणि सायंकाळी सहाला अशा दोन वेळा सातत्याने गावकरी भाविकांच्या उपस्थितीत महाआरती व हनुमान चालिसा पठण होते. विशेष म्हणजे महारुद्र मारुतीच्या मूर्तीला आजतागायत महिलांचा स्पर्शही झालेला नाही तसेच तब्बल दोन शतकांपासून महिला येथील मंदिरासमोरून कधीच चप्पल घालून गेलेल्या नाहीत, हातात चप्पल घेऊन गावाच्या बाहेर निघाल्यावर पायात चप्पल घालतात, ही परंपरा आजही गावाने जपलेली आहे. २०१६ साली धर्मदाय आयुक्तांकडून झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यास महारुद्र मारुती संस्थानने योगदान दिले होते. श्रावणात मंदिरातर्फे विशेष करून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आयोजित केले जातात. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर प्रशासनाने १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्याचबरोबर भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध आरओ प्लँट, राहण्यासाठी भक्तनिवास आहे. प्रसिद्ध : महारुद्र मारुती मंदिर जिल्हाधिकारी कार्यालयापासून अंतर 5000 वेगळेपण : गावात मोठे धरण आहे. टोमॅटो मार्केट, भाजीपाल्याचे गाव म्हणून ओळख. कनेक्टिव्हिटी : नागपूर - मुंबई हायवे, जवळच समृद्धी महामार्गही. पाच कोटींपर्यंत निधी : जिल्ह्यात जागृत देवस्थान म्हणून महारुद्र मारुतीच्या मंदिराची ओळख आहे. नुकतेच श्री महारुद्र मारुती मंदिराला तीर्थक्षेत्राचा ब दर्जा मिळाला. देवस्थानाच्या विकासासाठी आता टप्प्याटप्प्याने पाच कोटींपर्यंत निधी येईल.
मकर संक्रांत आणि एकादशी निमित्त कन्नड तालुक्यातील भगवान गड, मेहेगाव (वासडी) येथे प्रवचनाचा कार्यक्रम झाला. महंत गणेशानंद महाराज शास्त्री यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘संत तुकाराम महाराजांनी ज्ञानाचे महत्त्व पहिल्याच चरणात सांगितले आहे. ज्ञान कधीच संपत नाही. व्यवहारातील वस्तू दिल्यावर कमी होतात. पण ज्ञान दिल्यावर वाढते’’. तुमच्याकडे एक लाख रुपये असतील आणि ते एखाद्याला दिले, तर खिसा रिकामा होतो. पण ज्ञान दिल्यावर ते वाढत जाते. ज्ञान स्वीकारायचे असेल, तर अंतःकरण शुद्ध असणे गरजेचे आहे. प्रपंचात सुख हवे असेल, तर गडावर सेवा करावी. देणाऱ्याचे हात हजार असतात. त्यासाठी सेवाभाव ठेवणे आवश्यक आहे. सेवा केल्यानंतर त्याचा मेवा नक्की मिळतो. जेव्हा अंतःकरणात सेवाभाव निर्माण होतो, तेव्हा त्यातून आनंद मिळतो. येथे दिल्याने त्याची वाढ होते. अन्न शुद्धीसाठी अन्नदान करावे. प्रपंचात किती कमावले, याला अर्थ नाही. दान, धर्म आणि सेवा हेच कायम आपल्याबरोबर राहतात. भगवंताशिवाय मृत्युलोकातून कोणीही सुटू शकत नाही. गड सर्वांचा आहे. तो माझा एकट्याचा नाही. नाम फुकट आहे. त्यासाठी अंतःकरण शुद्ध असावे लागते, असा हितोपदेशही महाराजांनी दिला. एकादशीनिमित्त फराळ दान करण्यात आले. राहुल आनंद सोनवणे आणि भावलाल कोडीबा डिघोळे यांनी हे दान केले.
ग्रामपंचायत अधिकारी तथा प्रभारी विस्तार अधिकारी दशरथ खराद, राधाकिसन चौधरी व ईश्वर सोमवंशी यांच्यासह ११ जणांना सेवा जेष्ठतानुसार पदोन्नती मिळाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित (भा.प्र.से.) यांनी जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायत अधिकारी यांना विस्तार अधिकारी (पंचायत- ७) व विस्तार अधिकारी (कृषी- ४) अशा एकूण ११ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन नववर्ष व मकर संक्रांतीच्या एक प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. या कामी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राघवेंद्र घोरपडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) चंद्रहार ढोकणे यांनी पारदर्शकपणे प्रशासकीय कर्तव्य बजावले. तसेच छत्रपती संभाजीनगर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य कोषाध्यक्ष भिमराज दाणे, कोषाध्यक्ष जिल्हा संघटना प्रवीण नलावडे, आसाराम बनसोड, आर. डी. चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. पंचायत समिती पैठणमार्फत पदोन्नती झालेल्या ग्रामपंचायत अधिकारी यांना गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांनी नुकताच प्रशासकीय निरोप देऊन त्यांना पदोन्नत ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले. ग्रामपंचायत अधिकारी तथा प्रभारी विस्तार अधिकारी दशरथ खराद यांची पदोन्नती पंचायत समिती (छत्रपती संभाजीनगर) येथे विस्तार अधिकारी (पंचायत), आर. डी. चौधरी यांची पंचायत समिती (सिल्लोड) येथे विस्तार अधिकारी (पंचायत) तर ईश्वर सोमवंशी यांची पंचायत समिती (कन्नड) येथे विस्तार अधिकारी (कृषी) या पदावर पदोन्नती झालेली आहे.
वेरूळ ते खुलताबाद घाट रस्ता ऊस वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. मुख्य वेरूळ गावापासून खुलताबाद घाटापर्यंतचा वळण रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावरून दोन ट्रॉल्या जोडलेले ट्रॅक्टर जातात. चढ-उतार, तीव्र वळण आणि भरलेली ट्रॉली यामुळे ट्रॅक्टरचे पुढचे चाक हवेत उचलले जाते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. वेरूळ, खुलताबाद, कन्नड, गदाना, टापरगाव, आलापूर, अंतापूर, केसापूर, गल्लेबोरगाव, पळसवाडी या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा काढणी हंगाम सुरू आहे. त्यामुळे दररोज डबल ट्रॉली ट्रॅक्टर घाटातून जात आहेत. सोमवारी एका ट्रॅक्टरला दुसऱ्या ट्रॅक्टरने टोचन करून घाट चढवण्यात आला. या वेळी पर्यटक आणि वाहनचालकांचा जीव धोक्यात आला. वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर परिसरात विदेशी पर्यटकांची वर्दळ असते. याच मार्गावरून अवजड ट्रॅक्टर जात असल्याने अपघात होत आहेत. चांगोबा वळणावर ट्रॅक्टर पलटी होणे, ट्रॉली घाटात उतरणे हे प्रकार रोजचे झाले आहेत. एका युवकाचा पाय ट्रॉली तुटल्याने चिरडला गेला आहे. पोलिस प्रशासनाने रात्री ९ ते सकाळी ५ दरम्यान ट्रॅक्टर वाहतूक थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही ट्रॅक्टरचालक आणि कारखाने आदेश पाळत नाहीत. त्यामुळे पर्यटकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. नागरिकांनी सहकारमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
आजही राजमाता जिजाऊंच्या विचारांची गरज- वहाटुळे:आमठाणा येथील न्यू हायस्कूलमध्ये जयंती साजरी
हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी परिश्रम घेतले. आजच्या आधुनिक काळातही राजमाता जिजाऊ यांच्या विचारांची खरी गरज आहे, असे प्रतिपादन चित्तेपिंपळगाव येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलचे पर्यवेक्षक कडुबा वहाटुळे यांनी केले आहे. सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील न्यू हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त पर्यवेक्षक कडुबा वहाटुळे होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक साईनाथ सोमवंशी, गायकवाड होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा परिधान केली होती. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे कडुबा वहाटुळे म्हणाले की, न्यू हायस्कूलशी माझे भावनिक नाते आहे. या शाळेवरच पहिल्यांदा माझी नियुक्ती सर्वप्रथम झाली होती. येथून सुरू झालेला शैक्षणिक प्रवास चित्तेपिंपळगाव येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या पर्यवेक्षक पदापर्यंत पोहोचलो. मला या शाळेत आयुष्याची सुरुवात आणि सेवानिवृत्तीनंतर येण्याचा मिळालेला मान हा दुग्धशर्करा योग आहे. कुठेही जा पण आपली सुरुवात व शेवट कधीही विसरू नका, असे भावनिक आवाहनही वहाटुळे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले. या वेळी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानानंतर आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. शुक्रवारी (१६ जानेवारी) सकाळी ९ वाजता एकाच वेळी २९ प्रभागांच्या मतमोजणीच्या प्रक्रियेला प्रारंभहोणार आहे. प्रशासनाने यासाठी चोख बंदोबस्त तैनात केला असून दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत सर्व प्रभागांचे अधिकृत निकाल हाती येतील, असा अंदाज आहे. नियोजनाचे स्वरूप सुरुवातीला पोस्टल बॅलेटची (टपाली मतदान) मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू केली जाईल. प्रत्येक प्रभागासाठी ८ ते २१ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून ९ निवडणूक निर्णय अधिकारी यावर देखरेख करतील. प्रभाग १८ मध्ये सर्वात कमी ६ फेऱ्या असल्याने तिथला निकाल सर्वात आधी लागण्याची शक्यता आहे, तर प्रभाग ६ आणि १४ मध्ये सर्वाधिक २६ फेऱ्या होतील. मतमोजणीची चार केंद्रे गरवारे स्टेडियमः प्रभाग १, ७, ८, ९, १०, ११, २३, २४, २५.शासकीय तंत्रनिकेतन : प्रभाग १५, १६, १७, २६, २८, २९.शासकीय अभियांत्रिकी : प्रभाग २१, २२, २७, १८, १९, २०,सेंट फ्रान्सिस हायस्कूलः प्रभाग ३, ४, ५, ६, १२, १३, १४. (उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पडणार असून, मतमोजणीसाठी स्वतंत्र अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती. उस्मानपुरा आणि जालना रोड परिसरात बदल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (१६ जानेवारी) पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील उस्मानपुरा आणि जालना रोड परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रांवर होणारी गर्दी आणि कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी १६ जानेवारीला सकाळी ७ वाजेपासून मतमोजणी संपेपर्यंत काही मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश जारी केले आहेत. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय (उस्मानपुरा), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (उस्मानपुरा) आणि सेंट फ्रान्सिस स्कूल (जालना रोड) या तीन ठिकाणी मतमोजणी होणार आहे. यामुळे या भागात उमेदवारांचे कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक नियमन करण्यात आले आहे. वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग विट्स हॉटेलकडून येणाऱ्यांसाठी : विट्स हॉटेल चौक - कोकणवाडी चौक - गोपाल टी - उत्सव चौक - भाजीवाली बाई पुतळा चौक - पीरबाजार चौक - गाडे चौक मार्गे वाहने ये-जा करतील. बंद : सेव्हनहिल उड्डाणपूल (पूर्व बाजू) ते आकाशवाणी चौक रस्त्याची दक्षिण बाजू (जालना रोडवर अहिल्यानगरकडे जाणारा रस्ता). पर्यायी मार्ग जालना रोड व रेल्वे स्टेशनकडून: विट्स हॉटेल चौक - रेल्वेस्टेशन चौक - महानुभव चौक - एम.आय.टी. उड्डाणपूल - गोदावरी पुलाखालून - दर्गा चौक - भाजीवाली बाई पुतळा चौक - पिरबाजार चौक - गाडे चौक तसेच उत्सव चौक मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.
निवडणुकीच्या धामधुमीत जळगाव शहराच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सुप्रीम कॉलनी परिसरात मतदानाचे एक अतिशय धक्कादायक चित्र समोर आले. एका उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी चक्क एखाद्या शाळेतील वर्गाप्रमाणे मतदारांची हजेरी घेऊन, रजिस्टरमध्ये नोंद करून लक्ष्मीदर्शन घडवल्याचा प्रकार उघडकीस आला. याचे व्हिडिओ पुरावेही ‘दिव्य मराठी’कडे उपलब्ध झाले आहेत. सुप्रीम कॉलनीतील या प्रभागात पैसे वाटपात कोणतीही चूक होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी आगळीच शक्कल लढवली होती. या प्रक्रियेत सर्वप्रथम मतदारांना एका रिक्षात बसवले जात असे. त्यानंतर एक कार्यकर्ता मतदारांकडील मतदान चिठ्ठ्या गोळा करून त्यांची एका स्वतंत्र रजिस्टरमध्ये सविस्तर नोंद करत होता. नोंद पूर्ण झाल्याची खात्री करण्यासाठी तो कार्यकर्ता प्रत्येक मतदाराचे नाव मोठ्याने पुकारून त्यांची हजेरी घेत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. हजेरी पूर्ण झाल्यानंतर दुसरा एक कार्यकर्ता खिशातून ५०० रुपयांच्या नोटांची गड्डी काढून मतदारांच्या संख्येनुसार पैसे रिक्षाचालकाच्या ताब्यात देत असे. मात्र, हे पैसे मतदारांना लगेच न देता, त्यासाठी एक अट घालण्यात आली होती. या सर्व मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केल्यानंतर त्यांच्या बोटावरची शाई नीट तपासूनच त्यांना पैसे दे असा दम कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला दिला होता. कार्यकर्त्यांच्या आदेशानुसार रिक्षाचालकाने होकारार्थी मान हलवत पैसे खिशात टाकले आणि रिक्षा थेट मतदान केंद्रावर नेली. केंद्रावर मतदारांनी ठरल्याप्रमाणे बोटावरची शाई दाखवल्यावरच त्यांना रोख रक्कम वाटण्यात आली. मतदार याद्यांचा मोठा गोंधळ प्रभाग क्रमांक ३ आणि १६ मध्ये मतदार याद्यांचा गोंधळ समोर आला. प्रभाग रचनेतील तांत्रिक त्रुटी आणि भौगोलिक सीमांमुळे मतदारांची गोची झाली असून, यामुळे अनेक कुटुंबांमध्ये विभागणी झाल्याचे पाहायला मिळाले. प्रभाग ३ आणि १६ एका रस्त्याने विभागले गेल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एकाच कुटुंबातील काही सदस्यांची नावे प्रभाग १६च्या यादीत, तर काहींची नावे प्रभाग ३ च्या मतदार यादीत आढळली. प्रभाग क्रमांक १५ मध्ये अनपेक्षित घडामोडींमुळे तणाव सेंट लॉरेन्स शाळेच्या गल्लीत सकाळपासूनच उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या ताफ्यांची मोठी वर्दळ होती. मात्र, सायंकाळच्या सत्रात या परिसरात अनपेक्षित घडामोडींमुळे तणाव निर्माण झाला. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सेंट लॉरेन्स शाळेच्या केंद्रावर अचानक ३०० ते ४०० मतदारांची गर्दी उसळली. या गर्दीतूनच उमेदवारांच्या समर्थकांवर गंभीर आरोप करण्यात आले. रिक्षा उभी करून पैसे वाटप प्रभाग क्रमांक १६मध्ये आचारसंहितेचे धिंडवडे उडवणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका उमेदवाराने चक्क मतदारांच्या रांगा लावून भररस्त्यात पैसे वाटप केले. त्याचे व्हिडिओ पुरावेही उपलब्ध झाले आहेत. दुपारी ४ वा. एका उमेदवाराने घराशेजारी गल्लीत एक रिक्षा उभी केली होती. रिक्षाच्या आडोशाने मतदारांना पैसे वाटले जात होते. पैसे घेणाऱ्यांची गर्दी वाढल्यामुळे तिथे रांगा लागल्या. पत्रकार आल्याचे लक्षात येताच उमेदवाराची भंबेरी उडाली. त्याने पैसे वाटणाऱ्या तरुणाला बाजूला सारले आणि काही काळासाठी वाटप थांबवले. पोलिसांचे गस्तपथकही दाखल झाले. पोलिस गाडी पाहताच मतदारांची गर्दी पांगवण्यात आली. मात्र, तोपर्यंत पैसे वाटपाचा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. अरुंद गल्ल्यांत मतदारांची गर्दी प्रभाग क्रमांक १४ मध्ये तांबापुरातील अरुंद गल्ल्याचा भाग आहे. सकाळी ९ वाजेपासूनच तेथे मतदार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींची लगबग सुरू झाली. थोड्याच वेळात काही विशिष्ट कार्यकर्त्यांच्या घरांत मतदार याद्यांनुसार उपलब्ध मतदारांना पैसे देण्याचे काम सुरू झाले. या वेळी एका गल्लीत शेकडो मतदार एकाच वेळी आल्याने प्रचंड गोंधळ उडाला. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचताच उमेदवार प्रतिनिधी दुचाकीवरून निघून गेले.
आता ग्रामीणमधील वर्चस्वाच्या राजकीय लढाईला सुरुवात:जिल्हा परिषदेसाठी आजपासून रणधुमाळी सुरू
राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात ७३ गटातून जिल्हा परिषद सदस्य तर पंचायत समितीमधून १४६ सदस्य निवडीसाठी २९ लाख ७६ हजार ४५४ मतदार पात्र आहेत. शहरातील राजकीय वर्चस्वाचा फैसला शुक्रवारी होत असताना आता मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदांच्या वर्चस्वाची लढाई सुरु होत आहे. ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या १२ जिल्हा जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला. त्यात मराठवाड्यातील लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे जिल्हा परिषदेसाठी प्रशासनाने तयारी केली असून १३ तालुक्यातून ३ हजार ६०५ मतदान केंद्रे तयार करण्यात येणार आहेत, २३ हजार ३७३ कर्मचारी एकूण निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात आहेत. ७ हजार ९३१ ईव्हीएम मशीन तर ३ हजार ९६६ युनिट कंट्रोल मशीन मतदान प्रक्रियेसाठी लागणार आहेत. प. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद पक्षीय बलाबल पुणे : भाजप ७, राष्ट्रवादी ४४, शिवसेना १३, काँग्रेस ७, अन्य ४सोलापूर : भाजप १४, काँग्रेस ७, राष्ट्रवादी २३, शिवसेना ५, अन्य १९कोल्हापूर : भाजप १४, काँग्रेस १४, राष्ट्रवादी ११, शिवसेना १०, अन्य १८सातारा : भाजप ७, काँग्रेस ७, राष्ट्रवादी ३९, शिवसेना २, अन्य ९सांगली : भाजप २३, काँग्रेस १०, राष्ट्रवादी १४, शिवसेना ३, अन्य १० दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ? नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्यात मोठे यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे भाजपविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन अजित पवारांनी महापालिका निवडणूक लढवली. आता जिल्हा परिषद हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत. ग्रामीण भागातील वर्चस्व टिकवण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याची माहिती पक्षातील सूत्राने दिली.
वसमत तालुक्यातील रांजोना शिवारातील शेतात तरुणाचा खून झाल्याची घटना १५ रोजी सकाळी उघड झाली. घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटना उघड झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत गुन्ह्याची उकल केली. कुटुंबात मोठ्या भावालाच सर्वजण सन्मान देतात, व्यवहार त्याच्याकडे असल्याने द्वेषातून लहान भावानेच मोठ्या भावाचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे स्पष्ट झाले. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. नवनाथ साळवे असे मृताचे, तर गजानन साळवे असे संशयिताचे नाव आहे. रांजोना शिवारातील शेतात तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती हट्टा पोलिसांना डायल ११२ वरून मिळाली होती. सहायक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक संजय केंद्रे यांच्या पथकाने सकाळी ७ वाजता घटनास्थळ गाठले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेह रांजोना येथील नवनाथ साळवे याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या डोक्यात दगडाने वार करून खून केल्याचे दिसून आले. या प्रकरणी हट्टा पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणत असतानाच आरोपींची माहिती घेतली. पोलिसांनी मृत नवनाथ याचा लहान भाऊ गजानन साळवे याची चौकशी केली. त्याने खुनाची कबुली दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आपल्या भावाचा खून केल्यावर पुन्हा घरी येऊन शांत झोपला मृत नवनाथ हा शेतात झोपण्यासाठी गेला होता, तर संशयित गजानन व त्याचे आई, वडील रांजोना येथे घरी झोपले होते. मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास गजानन याने घराला बाहेरून कुलूप लावून शेतातील आखाडा गाठला. त्या ठिकाणी झोपेत असलेल्या नवनाथवर त्याने दगडाने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर पुन्हा घरी येऊन तो झोपी गेला.
वर्ष २०२५ मध्ये देशात ५० हजारांहून अधिक नवीन स्टार्टअप सुरू झाले. म्हणजेच सरासरी दररोज १३६ नवीन स्टार्टअप उघडले गेले. आता देशात २.०९ लाख नोंदणीकृत स्टार्टअप झाले आहेत. गेल्या स्टार्टअप नोंदणी काळात (जानेवारी, २०२५) देशातील स्टार्टअपची संख्या १.५९ लाख होती. गेल्या एका दशकातील ही सर्वात वेगवान वार्षिक वाढ आहे. ५२.६ टक्के स्टार्टअप हे मेट्रो शहरे नव्हे तर टियर-२ आणि टियर-३ शहरांमधील आहेत. ५० टक्के स्टार्टअपमध्ये किमान एक महिला संचालक आहे. त्यात त्या किमान बेबी प्रॉडक्ट्सपासून ते अवजड उद्योग यंत्रसामग्री बनवणाऱ्या संस्थांशी जोडल्या गेल्या आहेत. गेल्या एका दशकात स्टार्टअप्सनी देशभरात सुमारे २१ लाख नोकऱ्या निर्माण केल्या. म्हणजेच एका स्टार्टअपने सरासरी १० लोकांना थेट रोजगार दिला. गेल्या वर्षी केवळ ७ स्टार्टअप युनिकॉर्न (एक अब्ज डॉलर किंवा त्याहून अधिक मूल्य असलेली कंपनी) बनले. डीपीआयआयटीचे संयुक्त सचिव संजीव यांच्या मते, देशात गेल्या १० वर्षांत ६,३८५ स्टार्टअप बंद झाले आहेत. इकोसिस्टिम : आयपीओ आणण्यास कमी वेळ ओरिओस व्हेंचर पार्टनर्सनुसार, २०२५ मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या २० स्टार्टअप्सनी हे यश १३.३ वर्षांत मिळवले. २०२४ मध्ये यासाठी सरासरी १३.४ वर्षे लागली होती. मात्र, २०२३ मध्ये मामाअर्थ व यात्रा यांनी १२.५ वर्षांतच शेअर बाजारात स्थान मिळवले होते. २०२२ व २०२१ मध्ये हा टप्पा गाठण्यासाठी १६ वर्षे लागली होती. म्हणजेच भारतीय स्टार्टअप कमी वेळात आयपीओसाठी तयार होत आहेत. एक दशक पूर्ण झाल्यानिमित्त आज कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी स्टार्टअप इंडिया उपक्रमाला एक दशक पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात सहभागी होतील. स्टार्टअपची सुरुवात १६ जानेवारी २०१६ ला झाली होती. फंडिंग: भारताच्या पुढे फक्त अमेरिका-ब्रिटन ट्रॅक्सनच्या अहवालानुसार स्टार्टअप्सनी २०२५ मध्ये ९४,५०० कोटी उभे केले. अमेरिका आणि ब्रिटननंतर भारत तिसरी सर्वात मोठी फंडेड स्टार्टअप इकोसिस्टिम बनून राहिला आहे. लाइफ स्किल: जीडीपीत १५% योगदान शक्य भारत ‘स्टार्टअप इंडिया’ कडून ‘आंत्रप्रेन्योरियल भारत’ कडे वाटचाल करत आहे. ‘द इंडस आंत्ररप्रेन्योर्स’च्या अहवालानुसार उद्योजकता (आंत्रप्रेन्योरशिप) हे एक आवश्यक जीवन कौशल्य म्हणून शिकवले गेले पाहिजे. २०३५ पर्यंत ७५% माध्यमिक शाळांमध्ये आणि ८०% उच्च शिक्षण संस्थांमध्ये याचा समावेश करणे आवश्यक आहे. असे झाल्यास स्टार्टअप्स जीडीपीत १५% योगदान देईल. राज्य एकूण स्टार्टअप बंदमहाराष्ट्र 34,444 1200कर्नाटक 20,330 845दिल्ली 19,273 737उत्तर प्रदेश 19,207 598गुजरात 16,805 348तामिळनाडू 13,105 338तेलंगण 10,804 368हरियाणा 10,295 306केरळ 7,768 241राजस्थान 7,103 211मध्य प्रदेश 6,493 180
‘मी गद्दार नाही, दानवेच 4 दिवसांपासून गायब’:मतदानाच्या दिवशी खैरेंचे टीकास्त्र
महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला. खैरे यांच्या संतापाचे मुख्य कारण माजी महापौर रशीदमामू यांना देण्यात आलेली उमेदवारी हे आहे. खैरे म्हणाले, “रशीदमामू यांना मी तिकीट दिलेले नाही, ते दानवे यांनी स्वतःच्या मनमानीने दिले आहे. तिकीटवाटपाच्या संपूर्ण प्रक्रियेत मला अंधारात ठेवण्यात आले. निवडून येणाऱ्या निष्ठावंत महिलांची तिकिटे कापून दानवेंनी भाजपला पूरक ठरेल असे राजकारण केले आहे.’ पालकमंत्री संजय शिरसाट यांनी “मी खैरे यांना तिळगूळ देईन, दानवेंना नाही,’ असे विधान केल्यावर दानवे यांनी “खैरेंनी विधानसभेत शिरसाटांचे काम केले असावे,’ असा टोला लगावला होता. यावरून खैरे प्रचंड भडकले. ‘दानवेला कळत नाही का? मी आयुष्यभर पक्षाशी प्रामाणिक राहिलो, मी गद्दारी करणारा माणूस नाही. दानवे यांना अक्कल नाही,’ अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. “हे मतदान होऊ द्या, मग मी अंबादास दानवे यांच्याविरोधात मोठी पत्रकार परिषद घेऊन सर्व सत्य बाहेर काढणार,’ असा इशाराही त्यांनी दिला. निवडणुकीच्या ऐन मतदानाच्या दिवशी दोन बड्या नेत्यांमधील हा संघर्ष ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत दानवे यांनी उमेदवारी मागितली होती. तेव्हापासून दोन्ही नेत्यांतील वाद टोकाला पोहोचला होता. त्यावेळी पक्षाने खैरे यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर महापालिका निवडणुकीत दानवे यांच्या पुढाकाराने माजी महापौर राशीदमामू यांचा उद्धवसेनेत प्रवेश झाला. त्याला खैरे यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा टोकाला पोहोचले. ‘मातोश्री’वर तक्रार खैरे यांनी असा दावा केला की, अंबादास दानवे हे गेल्या ४ दिवसांपासून निवडणूक प्रचारातून गायब आहेत. या संदर्भात त्यांनी थेट ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.
महापालिकेच्या ११५ जागांसाठी मतदान संपल्यानंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांना पुन्हा एकत्र यावे लागेल, असे चित्र आहे. दोन्ही पक्षांना एकत्र येऊनही बहुमतापर्यंत जाता आले नाही, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतली जाईल. महापालिकेच्या ११५ जागांपैकी जवळपास ३५ ते ४० जागांवर मुस्लिम मतदारांचे प्राबल्य आहे. त्यामुळे उर्वरित ७५ ते ८० जागांसाठी महायुतीमध्ये स्पर्धा होती. युती केल्यास आपल्या वाट्याला पुरेशा जागा येणार नाहीत. त्यामुळे शहरात मोठा पक्ष ठरण्याच्या उद्दिष्टाला सुरूंग लागू शकतो. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांना न्याय देता येणार नाही. त्यामुळे भाजप व शिंदेसेनेने युती तोडण्याचा निर्णय घेतला. त्यातून उद्धवसेना स्पर्धेत आल्याचे मानले जाते. हिंदू मतदारांचे प्राबल्य असलेल्या बहुतांश जागा शहराच्या पूर्व आणि दक्षिण भागांत आहेत. सिडको-हडको या पूर्व छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात चुरस होती. मात्र, मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीयांचे प्राबल्य असलेल्या भागात उद्धवसेनेचाही जोर होता. त्यामुळे मतविभागणीचा फटका तिन्ही पक्षांना बसू शकतो. मतदारांनी पॅनल तोडून क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चाही सिडको-हडकोत जास्त होती. आपल्या भागातले, आपल्या ओळखीचे, नातेसंबंध आणि जात यांच्या आधारावर मतदान करण्यात आले. अजित पवार गटाकडे लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात ७८ जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. १० ते १२ जागांवर पक्षाचे उमेदवार शर्यतीत असल्याचे मानले जाते. त्यातून ४ ते ६ जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मदत महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजप व शिंदेसेनेला होईल, असे मानले जाते. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शिवसेना, भाजपच्या विरोधात असलेली उद्धवसेनेकडे जाणारी मते आपल्याकडे वळवल्याचे मानले जाते. शिवसेना, भाजपची कामगिरी वर्ष एकूण जागा भाजप शिवसेना१९८८ ६० ०० २७१९९५ ८२ ०७ ३४२००० ८३ १६ २०२००५ ९९ २१ २६२०१० ९९ १५ ३०२०१५ ११५ २२ २८ दक्षिण शहरात मतदानात चुरस दक्षिण संभाजीनगरमध्ये शिवसेना व भाजप यांच्यात स्पर्धा तीव्र होती. त्याच वेळी उद्धवसेनेची ‘कमिटेड व्होटर्स’ भिस्त होती. दुपारी चार-साडेचारनंतर मतदारांची संख्या वाढली. त्यामुळे काही भागांत मतदान केंद्रांवर साडेपाचनंतरही रांगा होत्या. बहुतांश प्रभागांत हिंदू मतदारांचे प्राबल्य असले तरी मुस्लिम व मागासवर्गीयांच्या वसाहतीही आहेत. एमआयएमचे उमेदवार नाहीत. काँग्रेसचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मुस्लिम मते उद्धवसेनेच्या पारड्यात जाण्याची शक्यता जास्त आहे. दक्षिण संभाजीनगरमधील काही प्रभागांत उद्धवसेना शर्यतीत येईल, असे मानले जाते. कार्यकर्त्यांच्या दबावाखाली तुटली युती महापालिकेची निवडणूक दहा वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येकी दोन निवडणुका झाल्या. या निवडणुकांत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून कष्ट उपसले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या निवडणुका प्रतिष्ठेच्या होत्या. त्या वेळी शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे युतीला यश मिळाले. या निवडणुकांत कार्यकर्त्यांना महापालिकेच्या उमेदवारीसाठी शब्द दिले होते. त्यामुळे मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कार्यकर्ते इरेला पेटले. त्यामुळे दोन्ही पक्षांवर स्वबळावर निवडणुका लढण्याची वेळ आली.
इराणमध्ये महागाई, सामाजिक असमानता आणि राजकीय अस्थिरतेमुळे नागरिक रस्त्यावर उतरले असून, देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे. डिसेंबर महिन्यात अमेरिकेने इराणवर लादलेल्या आर्थिक निर्बंधामुळे आणि इस्रायलविरुद्धच्या संघर्षामुळे देशात महागाई ४२ टक्क्यांनी वाढली असून सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा गंभीर परिणाम झाला आहे. आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच सरकारकडून निष्पाप आंदोलकांवर कठोर कारवाई […] The post अस्थिर इराण! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्राच्या शाश्वत विकासात युवकांची भूमिका महत्त्वाची
चाकूर : प्रतिनिधी राष्ट्राच्या विकासात युवकाची भूमिका महत्त्वाची असून आजचा युवकच आदर्श राष्ट्राची निर्मिती करू शकतो. युवाशक्ती ही परिवर्तन करणारी शक्ती असून, राष्ट्राच्या शाश्वत विकासात युवकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन गटविकासाधिकारी संतोष वांगवडे यांनी केले. संजीवनी महाविद्यालय चापोली व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन चाकूर तालुक्यातील […] The post राष्ट्राच्या शाश्वत विकासात युवकांची भूमिका महत्त्वाची appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अपघातानंतर कार पेटली; शिक्षकाचा होरपळून मृत्यू
अहमदपूर : प्रतिनिधी अंबाजोगाई-अहमदपूर महामार्गावर लांजी पाटी परिसरातील पुलाजवळ भरधाव कार पुलाच्या कठड्यास जोरदार धडकून काही क्षणांतच पेट घेतलेल्या कारमधील सहशिक्षकाचा जागीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सुमारे ११.२५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. किनगावकडून अहमदपूरकडे एम.एच. २२ एच १९१४ क्रमांकाच्या कारने कोपदेव हिप्परगा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले माधव श्रीवाड […] The post अपघातानंतर कार पेटली; शिक्षकाचा होरपळून मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
३५९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या तिस-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १५ जानेवारी रोजी शहरातील ३७५ मतदान केंद्रांवर मतदान झाले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० ही मतदानाची वेळ होती. परंतु, बहूतांश मतदान केंद्रांवर सायंकाळी ५.३० वाजल्यानंतरही मतदारांच्या रांगा होत्या. त्यामुळे सायंकाळी ५.३० वाजता जे मतदार मतदान केंद्रांत रांगेत उभे होते त्या सर्वांना मतदान केंद्राच्या आत घेऊन […] The post ३५९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुलींचा महाराष्ट्र क्रिकेट संघ भुवनेश्वरकडे रवाना
लातूर : प्रतिनिधी अंध मुला-मुलींसाठी क्रिकेट खेळ विकासात सातत्याने कार्यरत असलेल्या क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड इन इंडिया या संस्थेमार्फत दि. १७ ते २२ जानेवारीदरम्यान भुवनेश्वर (ओरिसा) येथे अंध मुलींच्या सहाव्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी मुलींचा महाराष्ट्र क्रिकेट संघ भुवनेश्वरकडे रवाना झाला आहे. या स्पर्धेत देशातील १८ क्रिकेट संघ सहभागी […] The post मुलींचा महाराष्ट्र क्रिकेट संघ भुवनेश्वरकडे रवाना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ज्ञान हे माणसाच्या व्यक्तिमत्व विकासाचे साधन
लातूर : प्रतिनिधी जगामध्ये शालेय शिक्षण आणि आध्यात्मिक शिक्षण असे ज्ञानाचे प्रकार आहेत. शालेय ज्ञान हे भौतिक साधनांची परिपुर्तता करते तर आध्यात्मिक ज्ञान हे मनुष्याचे वैचारिक आणि व्यक्तिमत्व उंचावते. ज्ञान हे माणसच्या व्यक्तिमत्व विकासाचे साधन असल्याचे प्रतिपादन भिक्खु पय्यानंद थेरो यांनी केले आहे. पौष पौर्णिमेनिमित्त महाविहार, सातकर्णीनगर येथे आयोजित धम्मदेशना व सत्कार कार्यक्रमात ते बोलत […] The post ज्ञान हे माणसाच्या व्यक्तिमत्व विकासाचे साधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

26 C