भोंदू अशोक खरात प्रकरणात यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती. असे झाले असते तर बऱ्याच गोष्टी टाळता आल्या असत्या. अनेक स्त्रियांचे जीवन वाचले असते, असे रोखठोक मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्याला आज नाशिक येथील एका कोर्टापुढे हजर केला असता कोर्टाने त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे तो आता 1 एप्रिलपर्यंत कोर्टातच राहणार आहे. तूर्त त्याच्या काळ्या कारवायांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी झी 24 तासच्या एका कार्यक्रमात बोलताना उपरोक्त विधान केले आहे. त्या म्हणाल्या, अशोक खरात प्रकरण खूपच भयानक आहे. त्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. कोणत्याही बाबांवर डोळे बंद करून विश्वास ठेवणे योग्य नाही. आपण आंधळा विश्वास ठेवतो तेव्हा आपला घात होतो. आपल्याला डोळे उघडे ठेवून जगणे आवश्यक आहे. आपण आपल्या ग्रंथांचा आधार घेतला पाहिजे. सर्वकाही आपल्या आत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्याकडून अशा बाबा बुवाबाजीला प्रोत्साहन देऊ नका. असे पुढे आपल्यावर त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची गरज आहे. सरकार याविरोधात आपल्याला मदत करेलच. प्रकरण खूप अगोदरच उजेडात यायला हवे होते पत्रकारांनी यावेळी त्यांना अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस कारवाई करत प्रकरण मूळापर्यंत नेल्यासंबंधीचा प्रश्न केला. त्यावर अमृता म्हणाल्या, या प्रकरणी गर्व वाटण्याची काहीच गरज नाही. कारण, एवढे काही झाल्यानंतर हे प्रकरण त्यांच्यापर्यंत पोहोचले. ते अगोदरच त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तसे झाले असते तर बऱ्याच गोष्टी टाळता आल्या असत्या. अनेक स्त्रियांचे आयुष्य वाचले असते. देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत प्रकरण आल्यानतंर त्यांच्यावर कारवाई केली, पण हे खूप अगोदरच व्हायला हवे होते, असे त्या म्हणाल्या. श्रद्धा व अंधश्रद्धा काय असते? अमृता फडणवीस या प्रकरणी श्रद्धा व अंधश्रद्धेचा फरक स्पष्ट करताना म्हणाल्या, श्रद्धा आपल्या विचारांवर असते. आपल्या वेदांवर आपली श्रद्धा असते. चांगलेपणावरही असते. तुम्ही घरी बसून फळ पाहिजे म्हणून कुणाकडे गेलात व त्यासाठी शॉर्टकटमध्ये जे करता ती अंधश्रद्धा आहे. श्रद्धा स्वतःच्या आतून निघते. तुम्ही वेद, गीता, महाभारत वाचले आहे. तिथे खऱ्या जीवनातील शिकवण आहे. आपण कसे वागलो तर काय होऊ शकते याचे पाठ त्यात आहेत. आपल्याकडे सर्वच गोष्टी आहेत. हे सर्व वाचल्याने आपल्या जीवनात अधिक स्पष्टता येऊ शकते. श्रद्धा व अंधश्रद्धेत एकच फरक आहे. आपण आपल्या भविष्याविषयी अनिश्चित असतो तेव्हा आपण इथे-तिथे पाहतो. पण जेव्हा आपल्या मनात ठाम विश्वास असतो, तेव्हा सातत्याने मेहनत करकोत. आपल्या आदर्शांच्या मार्गावर चालत राहिलो, तर अशा कोणत्याही बुवाबाबांची गरज भासत नाही.
राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार-सुनेत्रा पवारांचा फोटो गायब
रायगड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अशोक खरात प्रकरणावरून सुनील तटकरे यांना लक्ष्य केलं जात आहे. तटकरेंवर टीका केली जात असताना रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत अजित पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब […] The post राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार-सुनेत्रा पवारांचा फोटो गायब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर-लासूर मार्गावरील शिंदेवाडी फाटा परिसरात शनिवारी रात्री एका तरुणावर अत्यंत क्रूर आणि अमानुष हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी एका 32 वर्षीय तरुणाला निर्जन स्थळी नेऊन त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले असून, यामध्ये त्याचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीताराम आळंजकर (वय 32) हे शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिंदेवाडी फाट्यावरून जात होते. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यालगत असलेल्या एका शाळेजवळून बळजबरीने उचलले आणि जवळच असलेल्या एका निर्जन शेतात नेले. त्याठिकाणी हल्लेखोरांनी सीताराम यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, हल्लेखोरांनी सीताराम यांच्या गुप्तांगावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर टाकले हल्ला केल्यानंतर आरोपींनी जखमी सीताराम यांना पुन्हा रस्त्यावर आणून टाकले आणि तिथून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत सीताराम बराच वेळ तिथेच मदतीसाठी विव्हळत पडून होते. घटनेची माहिती मिळताच त्यांचे चुलत भाऊ लक्ष्मण आळंजकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना रात्री साडेआठच्या सुमारास गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिस तपास सुरू या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत अधिकृत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हा हल्ला जुन्या वादातून झाला की अन्य काही कारणास्तव, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले, तर महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला आणि जनतेला मनापासून आनंद होईल. पक्षाचे जिल्हाध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते आणि आमदारांची अशीच इच्छा आहे की सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले आहे. सुनील शेळके यांच्यानंतर आता अण्णा बनसोडे यांनी देखील विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा काढल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अण्णा बनसोडे म्हणाले, शरद पवार हेत आमच्यासाठी दैवत आहेत आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव सर्वांना मान्य आहे. मात्र 1999 पासून अजितदादांसोबत काम करत आलो आहे. आता सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी स्वीकारली आहे, ती त्या उत्तम प्रकारे पार पाडतील, असा विश्वास बनसोडे यांनी व्यक्त केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्हाला आनंद पुढे बोलताना अण्णा बनसोडे म्हणाले, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्हाला आनंद होईल. आम्ही सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आणि आता सर्व नेते आमदार यांनी इच्छा व्यक्त केली आहे की सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात. अजित पवार यांनी विलीनीकरणाबाबत कधीही चर्चा केलेली नव्हती. आता आम्हाला विश्वास आहे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात आम्ही व्यवस्थित पुढे जात आहोत आणि विलीनीकरणाबाबत योग्य निर्णय होईल. तटकरे आणि पटेल पक्षावर कब्जा करत आहेत का? सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पक्षावर कब्जा करत आहेत का, असा प्रश्न विचारला असता अण्णा बनसोडे म्हणाले, या आरोपात तथ्य नाही. तसेच सुनेत्रा पवार निर्णय घेण्यास कमी पडत आहेत का? यावर बनसोडे म्हणाले, त्यांनी आत्ताच कारभार हाती घेतला आहे. सर्वांचा विचार करून निर्णय घेतात. तसेच जय पवार यांची पत्रकार परिषद तटकरे आणि पटेल यांनी अडवली का? यावर आपल्याला काही माहीत नसल्याचे बनसोडे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत:सुनील शेळकेंच्या विधानाने खळबळ; सुनील तटकरेंनी मांडली पक्षाची भूमिका गेल्या काही दिवसांपासून थंडावलेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा आमदार सुनील शेळके यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत असेल, तर विलीनीकरणासाठी अजूनही वेळ गेलेली नाही, असे सूचक विधान शेळके यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडली आहे. वाचा सविस्तर
1500 युवक-युवतींना चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण:गडचिरोलीत 'प्रोजेक्ट उडान' अंतर्गत झाले स्वावलंबी
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि दुर्गम-अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी 'दादालोरा खिडकी'च्या माध्यमातून 'प्रोजेक्ट उडान' सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत दीड हजार युवक-युवतींना चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणाने ते स्वावलंबी बनले आहेत. हे प्रशिक्षण स्किलिंग इन्स्टिट्यूट, कौशल्य विकास विभाग आणि प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले जाते. नुकतेच 24 फेब्रुवारी ते 27 मार्च 2026 या कालावधीत आयोजित प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 180 जणांच्या तुकडीला 28 मार्च रोजी निरोप देण्यात आला. यामध्ये गडचिरोली, कुरखेडा, पेंढरीसह इतर उपविभागातील 120 पुरुष आणि 60 महिला प्रशिक्षणार्थी सहभागी होते. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना लर्निंग परवाना काढून देण्यात आला असून, लवकरच कायमस्वरूपी परवानाही दिला जाईल. स्किलिंग इन्स्टिट्यूट आणि पोलिस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली यांच्या माध्यमातून आजपर्यंत एकूण 1310 युवक-युवतींना चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण देऊन कायमस्वरूपी परवाना काढून देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, गडचिरोली पोलिस दल आणि सर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्रोजेक्ट संजीवनी' अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत. सर्च फाऊंडेशनच्या मा दंतेश्वरी रुग्णालय, चातगाव येथे गडचिरोली जिल्ह्यातील 13 आणि गोंदिया जिल्ह्यातील 1 अशा एकूण 14 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे ते आता लवकरच आई-वडील होऊ शकणार आहेत. आतापर्यंत गडचिरोली पोलिस दलाने एकूण 50 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया केली आहे. यापूर्वी शस्त्रक्रिया केलेल्या 36 पैकी 13 नक्षलवाद्यांना आतापर्यंत अपत्यप्राप्ती झाली आहे. आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी चार स्वतंत्र आणि सुसज्ज रो-हाऊसचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. तसेच, एकूण 72 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना लॉएड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड येथे कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. त्या भोंदू बाबासोबत सरकारमधील अनेकांचे संबंध असल्याचे पुढे आले आहे. सरकारच्या पापाचा घडा भरला आहे, आता ते भांडे फुटायची वेळ आली आहे, यामध्ये जे राजकारण सुरू आहे. हे अवैध धंदे सुरू होते त्यावेळी पोलिस झोपले होते का? असा सवालही पटोलेंनी केला आहे. नाना पटोले म्हणाले की, भाजपकडून लोकशाहीचा खून करण्यात आल्याचे दिसून आले. त्यांनी दोन्ही सभागृहात आपल्याला हवे तसे काम करता यावे म्हणून विरोधी पक्षनेता नेमला नाही.राज्यावर ज्यांचे दुरगामी परिणामहोतील असे कायदे पारित केले गेले. त्यामध्ये धर्मस्वातंत्र्याचा असो की महसूलचा कायदा असे बरेच कायदे आणले त्यातून शेतकऱ्यांना बरबाद करण्याचे ठरवले आहे. सर्वसामान्य जनतेला लुटायचे कायदे त्यांनी पारित केले. हे लोकशाही न मानणारे सरकार आहे. त्यांच्याकडून लोकशाहीची हत्या झाली. रॉकेल कुणासाठी? नाना पटोले म्हणाले की, सरकार बहीनींकडून 5 हजार रुपये काढून घेतले जातात. यावर मुख्यमंत्री बोलत नाही. त्यांनी सर्व विषयावर बोलले पाहिजे. सरकारकडून लाडक्या बहिणींच्या नावाने महिलांची फसवणूक करण्यात आली. सरकारकडून महिलांचा अपमान करण्यात येत आहे. रॉकेलचे तेल 86 रुपये दराने दिले जाणार आहे. रॉकेल कुणासाठी आणले जात आहे हे स्पष्ट नाही. गॅस असणाऱ्यांना त दिले जात नाही, मग त्यासाठी कोणाला पात्र ठरवले जाईल हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे. रॉकेल गरिबांसाठी देणार की श्रीमंत लोकांना देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. महायुतीकडून बहिणींच्या पैशांचा केवळ इव्हेंट नाना पटोले म्हणाले की, प्रत्येकच सरकार योजना सुरू करत असते. आम्ही सुद्धा संजय गांधी निराधार योजना सुरू केली होती. त्यामध्ये महिला, पुरुष होते पण काँग्रेसने त्यांचे पैसे देताना या आठवड्यात पैसे देतो त्या आठवड्यात पैसे देतो असे करत त्याला प्रसिद्धी दिली नाही. मात्र हे सरकार लाडकी बहीणचे पैसे या दिवशी देणार त्या दिवशी देणार असे सांगत प्रसिद्धी करते. हे पैसे काही त्यांच्या घरचे नाहीत. सत्ता आली तर 2100 रुपये देणार म्हणणारे आता सरकार येऊन सुद्धा 1500 रुपयेच देत आहे ते सुद्धा 3 महिन्यातून एकदा देत आहे. लाडक्या बहिणींना या लोकांनी धोका दिला. काँग्रेस काळातील योजना लोकांसाठीच्या होत्या. भाजप केवळ दिखावा करते.
मोदी सरकार आणि भाजपने देश वाऱ्यावर सोडला आहे. देशाची काळजी या सरकारला राहिली नाही, केवळ निवडणूक जिंकत सत्ता मिळवणे याकडे त्यांचे लक्ष आहे. देश संकटात असताना नेते प्रचाराचे भाषण करत फिरत आहेत. लोकांना लाइनमध्ये उभे करत जीव घेण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे, तरीही हे सांगतात की काही तुटवडा नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, रशियाने इंधन देण्यास नकार दिला आहे, मित्र देश असलेला इराण शत्रू झाला आहे. हिंदू-मुस्लीम करत देश पुढे जाऊ शकत नाही. इंधन टंचाईमुळे कोणाचे बळी गेले तर भाजप सरकार त्यासाठी जबाबदार असेल. टंचाई नाही म्हणता मग अकोल्यात जो बळी गेला तो कसा झाला आहे. ..तर महाराष्ट्र सरकारला हादरे बसतील विजय वडेट्टीवार म्हणाले की, खरातची वरात आता कुठेपर्यंत जाते हे येणारा काळ सांगेल. त्या पेनड्राईव्हमधील सगळ्या व्हिडिओ दाखवल्या तर महाराष्ट्र सरकारला हादरे बसतील आणि सरकारच अडचणीत येईल असे महाभाग या खरातच्या कृत्यामध्ये सहभागी आहेत.ते जर उघड झाले तर महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप येऊ येऊ शकतो. सरकारने कुणालाही वाचवू नये विजय वडेट्टीवार म्हणाले की, बदलापूरमध्ये सत्ताधारी पक्षातील व्यक्तीला वाचवण्यासाठी जसा एन्काउंटर करण्यात आला. बड्या लोकांना वाचवण्यासाठी खरातचे बरेवाईट करतील आणि पुरावे नष्ट करतील. त्यामुळे कायद्याने त्याला शिक्षा दिली पाहिजे. कुणालाही वाचवू नये, सरकारने या संदर्भात काळजी घेतली पाहिजे. केसरकरांनी आमदारांचे नाव जाहीर करावे विजय वडेट्टीवार म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी राज्यात जे वातावरण निर्माण झाले आहे ते गंभीर आहे. काल आमदार केसरकर यांनी एक विधान केले की खरातला 39 आमदार भेटले माझेच नाव का घेता? याचा अर्थ असा की खरातच्या काळ्या कृत्याला साथ देणारे, त्यावर पांघरुण घालणारे, तिथे पुजा करणारे, भोंदू गिरी वाढवणारे 39 जे आमदार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. कायदे बनवणारे जर कायद्याविरोधात वागत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. केसरकरांनी त्या 39 आमदारांची यादी जाहीर केली पाहिजे. चर्चेत येण्यासाठी वाघमारेंचे वक्तव्य विजय वडेट्टीवार म्हणाले की, ज्योती वाघमारे या नवीन नवीन खासदार झाल्या आहेत. त्यांना विधाने करणे गरजेचे आहे, माध्यमांनी दखल घेतली जावी म्हणून त्या ऑपरेशन टायगर, तुतारी सारखी व्यक्तव्य करत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली आहे. तसेच गॅस टंचाईच्या बाबतीत सरकारमध्येच मतभेद आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणतात गॅस टंचाई आहे, तर मुख्यमंत्री म्हणतात सगळे ठीक चालू आहे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. तसेच अशोक खरातच्या बाबतीत बोलताना म्हणाले की, भोंदूबाबाला भेटणाऱ्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. भोंदूबाबापेक्षा त्याची सेवा करणारे राज्यकर्ते अधिक गुन्हेगार, असा आरोपही राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गॅसच्या रांगेत मारामाऱ्या, लोक आजारी पडत आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणत आहेत की गॅसची टंचाई आहे. भुजबळ म्हणत आहेत. आधी कॅबिनेटमध्ये एकमत काय आहे ते पहा. मुख्यमंत्री म्हणतात सगळे ठीक आहे आणि मंत्री म्हणतात गॅसची टंचाई आहे. त्यांनी म्हटले आहे की विशिष्ट कालमर्यादे पलीकडे आम्ही गॅस पुरवू शकत नाही. सरकारमध्येच मतभेद आहेत. त्यांचेच लोक गॅसवर आहेत. पोलिस बंदोबस्तात गॅसचे वितरण करावे लागत आहे, हे कसले लक्षण आहे? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. अफवांचा उगम गुजरातमधून पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, या अफवा कोण पसरवत आहे? या अफवांचा उगम गुजरातमधून आहे. सर्वात जास्त रांगा गुजरातमध्ये लावल्या जात आहेत. जसे नोटबंदी होण्यासंदर्भातील पहिली माहिती ही गुजरातमध्ये कळली आणि गुजरातमध्येच लोकांनी 8 दिवस आधीच बँकेत रांगा लावल्या. अमित शहांच्या बँकेत एका तासात 500 कोटी रुपये जमा झाले. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री गुजरातचे असल्यामुळे त्या राज्यात ही माहिती लवकर कळली. गुजरातमध्ये या रांगा लागल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात धास्ती निर्माण झाली आहे. लॉकडाउन लागेल, गॅस टंचाई आहे, ही गुजरातवरून आलेली हवा आहे. गुजरातमध्ये मोठे मोठे ड्रम घेऊन लोक रांगेत उभे आहेत, असा दावाही राऊत यांनी केला. अशोक खरातची सेवा करणारे राज्यकर्ते अधिक गुन्हेगार राज्यात सध्या गाजत असलेला विषय म्हणजे अशोक खरात प्रकरण, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, सरकार अशोक खरातच्या मागे नसते तर हे जे 40 आमदार, खासदार, मंत्री तिथे सेवा करायला जात होते, त्यांची यादी सरकारने जाहीर केली असती. भोंदूबाबा पेक्षा त्याला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी अधिक गुन्हेगार आहेत. भोंदूबाबा तर आहेच, पण त्याच्या चरणाशी जाऊन सेवा करणारे जे आहेत, त्या राज्यकर्त्यांना अधिक अपराधी मानायला हवे. त्यामुळे अशा सगळ्यांची यादी जाहीर व्हायला पाहिजे. इतर गुन्ह्यात गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची नावे घेतली जातात, त्यांना चौकशीला बोलावले जाते. इथे दीपक केसरकरांना बोलावले? तटकरेंना बोलावले? रुपाली चाकणकर यांना बोलावले चौकशीला? एकनाथ शिंदेना बोलावले? राधाकृष्ण विखे पाटलांना बोलावले का चौकशीला? विचारा तर खरं त्यांना, तुम्ही का गेला होतात? कोणते विधि केले? त्याचा काय फायदा झाला? किती पैसे दिले? कुठून आले इतके पैसे? प्रश्न विचारला पाहिजे. अशोक खरातला अमित शहा यांच्या पर्यंत कोणी नेले? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. अशोक खरात मंत्रालयात कसा पोहोचतो? फोटो कोणी कोणाबरोबर कधीही फोटो काढू शकतो असे मुख्यमंत्री म्हणतात. मी मुख्यमंत्र्यांच्या मताशी सहमत आहे. तरीही माझा प्रश्न आहे, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, अशोक खरात सारखा भोंदूबाबा मुख्यमंत्र्यांपर्यंत कसा पोहोचला? कोणीतरी मध्यस्थी आहे, कोणीतरी दलाल आहे, जे या सरकारमध्ये असून या भोंदुबाबला मदत करत आहे. अशोक खरात मंत्रालयात कसा पोहोचतो? अशोक खरात अनेक मंत्र्यांच्या कामात कसा हस्तक्षेप करत होता? हा प्रकाश एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा मुद्दा आहे, असे संजय राऊत म्हणाले.
दहाचे शंभर करणाऱ्यांची जागा तुरुंगातच आहे. चुकीची कामे घेऊन माझ्याकडे केव्हाच यायचे नाही. कारण, चुकीच्या कामाला माझे कधीच समर्थन मिळणार नाही, असे कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. पंकजा मुंडे यांच्या हस्ते अंबाजोगाई येथील भाजपच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी उपरोक्त विधान केले. त्या म्हणाल्या, माझ्याकडून कोणत्याही चुकीच्या गोष्टींची अपेक्षा करू नका. काळ बदलला आहे. स्वतःची परिस्थिती व ऐपत ओळखून त्यात आनंदी राहण्यास शिका. ज्याची ऐपत 10 पैशांची आहे, त्याने कष्टाने त्याचे 15 पैसे करावेत. पण दहाचे शंभर करायला बघणाऱ्यांची जागा तुरुंगातच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अनेक वर्षांत हे दाखवून दिले आहे. त्यामुळे माझ्याकडे एकही चुकीचे काम घेऊन येऊ नका. चुकीच्या मार्गाने कमावले, तर अटक अटळ अंबाजोगाई व परळी परिसरातील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी भाजपने हे कार्यालय सुरू केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवली पाहिजे. मी तुम्हाला 10 लाखांचे पत्र दिले. त्यात नियमानुसार 1 लाख कमवा. पण काम दर्जेदार करा. घरांचे मजले कसे चढतात हे घरच्यांनी व बापाने विचारायला हवे. चुकीच्या मार्गाने कमावले तर कारवाई व अटक अटळ आहे हे लक्षात ठेवा, असे त्या म्हणाल्या. कारस्थानी लोक नकाशावरून गायब पंकजा मुंडे यांनी यावेळी राजकारणातील विश्वासघातकी प्रवृत्तीवर जोरदार प्रहार केला. त्या म्हणाल्या, काही लोक आपल्याला सोडून गेलेत. तर काही लोक आपला वापर करून दुसऱ्यांशी संधान साधण्याचा प्रयत्न करत गडबड करत आहेत. पण जो माझ्यासोबत कारस्थान करतो तो कुठे असतो? माझ्या हृदयात पाप नाही. त्यामुळे माझ्या पाठीशी देवाचा आशीर्वाद आहे. राजकारणात जय - पराजय होतच असतो. माझाही पराभव झाला. पण ज्यांनी हे कारस्थान केले ते आज नकाशावरून गायब झालेत. मला काहीच करावे लागले नाही. निसर्गच योग्य वेळी काय करायचे ते ठरवतो. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी सर्व शक्ती उभी राहते. त्यामुळेच तुम्हीच माझी खरी ताकद आहात. एखादा कार्यकर्ता आजारी असेल, त्याला कॅन्सरसारखा गंभीर आजार असेल, तर मी माझे घर गहाण ठेवून त्याला मदत करेन. पण कुणी चुकीची कामे करून किंवा फसवणूक करून संकटात सापडला असेल, तर मी त्याला कोणतीही मदत करणार नाही, असेही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट् केले.
खरात प्रकरणी संजय राऊत अनेकांची नावे घेत सहआरोपी करा म्हणत आहे, मग तोच न्याय लावायचा तर मिलींद नार्वेकर आणि ज्याच्या कार्यकाळात त्याला पाणी देण्यात आले त्या उद्धव ठाकरेंना सहआरोपी करायचे का असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे.भोंदू बाबा प्रकरणी सखोल चौकशी सुरू असून सरकार कोणालाही पाठिशी घालणार नाही, पाणी देण्यासाठी दबाव आणणाऱ्या संजय राऊतांनाही सहआरोपी करत त्यांची चौकशी केली पाहिजे का? याचे उत्तर राऊतांनी दिले पाहिजे. नवनाथ बन म्हणाले की, भोंदू बाबा अशोक खरातला मविआ सरकारने जे पाणी दिले त्यांचे राऊत समर्थन करत आहेत. त्यांच्याकडून किती रुपये दलाली घेतली. दलाली घेतली म्हणून तुम्ही असे आरोप करत आहात, याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. शेतकऱ्यांचे पाणी मविआने खरातला दिले. त्यांचे समर्थन राऊत करत आहे. दलालीमधून नेमके काय कमावले याचे उत्तर राऊतांनी दिले पाहिजे. खरातला बेड्या घालणारे सरकार महायुतीचे नवनाथ बन म्हणाले की, अशोक खरातला सरकार पाठिशी घालत नाही, मविआच्या कार्यकाळात त्याचे कारनामे समोर आले तरी तुम्ही त्याला पाठिशी घातले. देवाभाऊंचे सरकार या प्रकरणी तपास करत कारवाई करण्याचे आदे देत त्या भोंदू बाबाला अटक करण्यात आली. तुम्ही अनेक गुन्हेगारांना पाठिशी घातले हे मविआच्या काळात आम्ही पाहिले. मविआचे सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालणारे सरकार होते. खरातला बेड्या घालणारे सरकार हे महायुतीचे आहे, तुम्ही काही आरोप केले तरी त्यांचा परिणाम होणार नाही. कुठेही इंधन टंचाई नाही नवनाथ बन म्हणाले की, देशात किंवा महाराष्ट्रात कुठेही इंधन टंचाई नाही. 60 दिवस शिल्लक राहिल इतके इंधंनआपल्याकडे आहे. महाराष्ट्रात सुद्धा गॅसची टंचाई नाही. बुकिंग केल्यावर गॅस मिळतो तरीही संजय राऊत अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. तुम्ही कितीही अफवा पसरवल्या तरी जनता त्यावर विश्वास ठेवणार नाही. लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. तुम्ही अफवा पसरवत लोकांना पॅनिक करत राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात. परंतु तुमचा देश आणि राज्य पेटवण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाही. राऊतांनी इराणवर बोलू नये नवनाथ बन म्हणाले की, गॅससाठी गुजरातमध्ये रांगा लागत आहे. नोटबंदीसाठी तिथे रांगा लागत होत्या असे म्हणत राऊतांनी गुजरातवर सरकण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे. महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होत आहे. गॅस लोकांना मिळत आहे. उरणपर्यंत धाव नसणाऱ्या लोकांनी इराणच्या गप्पा मारू नये, असा टोलाही बन यांनी लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून थंडावलेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा आमदार सुनील शेळके यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत असेल, तर विलीनीकरणासाठी अजूनही वेळ गेलेली नाही, असे सूचक विधान शेळके यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडली आहे. सुनील तटकरे म्हणाले की, आमदार सुनील शेळके पुणे जिल्ह्यातील प्रभावी नेते आणि तरुण आमदार आहेत. अजितदादांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीने काम केले आहे. मोठ्या फरकाने ते मावळ मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी जी भावना व्यक्त केली ती व्यक्तिगत होती की त्यांच्याकडे यासंदर्भातील माहिती होती, मला कल्पना नाही. अंतिम निर्णय वहिनीच घेतील पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्त्वात पुढील काळात पक्षाचे काम सुरु राहावे, हा निर्णय सर्वांच्या सहमतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. मनावर प्रचंड मोठा आघात होऊनही ज्या पद्धतीने वहिनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संयमाने आणि सोशिकतेने कारभार करत आहेत. ही बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे. सुनील शेळके यांनी विलिनीकरणाबाबत जे काही म्हटले आहे, त्याबाबत चर्चा सुरु आहे का, मला माहिती नाही. पण त्याबाबतचा अंतिम निर्णय वहिनीच घेतील, असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. भाजपने राष्ट्रवादी पक्षाच्या कारभारात हस्तक्षेप केला नाही भाजपच्या दबावामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विलीनीकरण अडले आहे का? असा प्रश्न सुनील तटकरे यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, भाजपकडून कधी विलीनीकरणाबाबत दबाव राहिलेला नाही. ज्यावेळी आम्ही अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली एनडीए सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्यानंतरच्या घडामोडी सर्वांनी पाहिल्या आहेत. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याच बाबतीत कधीही हस्तक्षेप केलेला नसल्याचे तटकरे यांनी सांगितले. भाजपचा दबाव असण्याचा प्रश्न नाही तसेच भाजपच्या केंद्र आणि राज्य नेतृत्त्वाने आम्हाला नेहमीच मित्रपक्ष म्हणून सन्मानाची वागणूक दिली आहे. त्यामुळे भाजपचा दबाव असण्याचा प्रश्न नाही. प्रश्नांतर्गत आमचा विलीनीकरणाबाबत आमचे म्हणणे असण्याचे कारण नाही, यासंदर्भातील निर्णय वहिनीच घेतील. या क्षणाला माझ्याकडे यासंदर्भात कोणतीही माहिती नाही. पण ज्येष्ठ आमदार सुनील अण्णा कोणत्या संदर्भात हे वक्तव्य केले आहे, हे मला माहिती नाही. त्यामुळे मला या विषयावर मत व्यक्त करायचे नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सर्व मुद्दे केवळ 'जर-तर'च्या शक्यतांवर आधारित सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड ही त्यांच्या संमतीनेच घेण्यात आली असून, त्यानंतर पक्षाच्या विलीनीकरणाच्या विषयावर पूर्णपणे पडदा पडला आहे, असे स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचा दीर्घकाळ प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळताना आणि अजितदादांसोबत महाराष्ट्रभर दौरा करताना विलीनीकरणाबाबत पुन्हा कधीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या चर्चिले जाणारे हे सर्व मुद्दे केवळ 'जर-तर'च्या शक्यतांवर आधारित असल्याने, यावर आता अधिक भाष्य करणे अनावश्यक असल्याचे सांगत त्यांनी या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला.
मी तुमच्या लायकीचा वडील राहिलो नाही, मला माफ करा...’ अशा शब्दांत मुलाच्या मोबाइलवर पहाटे संदेश पाठवून एका 47 वर्षीय पित्याने मृत्यूला कवटाळले. जुगार आणि दारूच्या व्यसनापायी कर्जबाजारी झालेल्या अनिल मारुती नरवडे (वय 47, रा. पत्रा तालीम, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी शनिवारी छत्रपती संभाजीराजे तलावाजवळील रेल्वे पुलाजवळ आत्महत्या केली. धावत्या रेल्वेखाली उडी घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. नरवडे यांनी कर्जापायी स्वतःची दुचाकी 30 हजार रुपयांत एकाकडे गहाण ठेवली होती. या विवंचनेतून आणि स्वतःच्या कृत्याच्या पश्चात्तापातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असे बोलले जाते. शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास ते रेल्वे पुलाजवळ जखमी अवस्थेत आढळून आले. सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मोबाइलवरील संदेशात... मी तुमच्या लायकीचा बाप राहिलो नाही, वाईट मार्गाला लागल्यामुळे मी कधीच सुधरू शकलो नसतो. माझी गाडी कुठे गहाण ठेवली आहे, हे राहुल कोळीला माहीत आहे. कृष्णा, मी तुझ्यावर माझे सर्व ओझे सोडून जात आहे. तू आई आणि भावाचा सांभाळ कर. माझा मार्ग कधीच धरू नको कारण तो कधीच चांगला ठरला नाही. शुक्रवारी घराबाहेर पडले, फोन केला तरी घेतला नाही वडील शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घराबाहेर गेले होते. वारंवार फोन केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. माझ्या मोबाइलवर मेसेज पाठवला की, तणावातून आत्महत्या करत आहे. त्यांनी दुचाकीही गहाणवट ठेवली होती. त्यांचे मित्र याविषयी माहिती देतील असे संदेशात म्हटले आहे. कृष्णा नरवडे, मुलगा
'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल'च्या जयघोषात आणि विठू-माऊलीच्या चैतन्यमयी दर्शनासाठी अवघी पंढरी सज्ज झाली आहे. आज चैत्र शुद्ध एकादशी (कामदा एकादशी) निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपूजा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाली, ज्यामुळे मंदिर परिसर आध्यात्मिक ऊर्जेने उजळून निघाला आहे. ब्रह्ममुहूर्तावर नित्यपूजा संपन्न आज पहाटे 4.00 वाजता, जेव्हा अवघे विश्व निद्राधीन असते, तेव्हा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी भक्तीचा अर्घ्य अर्पण करण्यात आला. मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. प्रकाश जवंजाळ आणि संभाजी शिंदे यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा केली. मंत्रोच्चारांच्या गजरात आणि वारकरी संप्रदायाच्या शिस्तीत पार पडलेल्या या पूजेवेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे, सुनील रुकारी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुष्पसजावटीतून साकारले वैकुंठ चैत्र यात्रेनिमित्त देवाचे रूप अधिकच लोभस दिसत आहे. मंदिरातील चारखांबी, सोळखांबी आणि श्री संत नामदेव पायरी या भागांना विविधरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. ही सजावट पाहताना जणू वैकुंठ पृथ्वीवर अवतरल्याचा भास होत आहे. या सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे भक्तीचा महाकुंभकामदा एकादशीचे औचित्य साधून हजारो वारकरी चंद्रभागेच्या तीरी दाखल झाले आहेत. फुलांच्या सुगंधाने दरवळणारे मंदिर आणि विठ्ठलाचे सावळं रूप डोळ्यांत साठवण्यासाठी भक्तांची मांदियाळी जमली आहे. प्रशासनाने भाविकांच्या दर्शनासाठी चोख व्यवस्था केली असून, सर्वत्र आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे.
सिडकोतील साईकृपा हाउसिंग सोसायटीत राहणाऱ्या तरुणाने शुक्रवारी (28 मार्च) सायंकाळी गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. समीर राजेंद्र नाईक (34) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सिडको ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. समीर पूजापाठ करून आपला उदरनिर्वाह भागवतो. त्याच्या वडिलांचे निधन झाले असून, आई व लहान भावासह तो राहतो. शनिवारी सायंकाळी त्याचा भाऊ व आई बाहेर गेल्यावर त्याने हा प्रकार केला. काही वेळाने त्याची आई घरी परतल्यावर त्यांना समीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या शेजारीच एक पिस्तूल पडलेले होते. त्यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. तोपर्यंत त्याच्या डोक्यातून अतिरिक्त रक्तस्राव झाला होता. या घटनेची माहिती मिळताच सिडको ठाण्याचे सहायक निरीक्षक योगेश गायकवाड, उपनिरीक्षक अनिल नाणेकर, अंमलदार विशाल सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्या घरातून रिकामे काडतूस व गावठी कट्टा जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सध्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्या डोक्यात डाव्या बाजूने गोळी शिरलेली आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. जीवन राजपूत यांनी दिली. अनुत्तरित प्रश्न1. समीरकडे बंदूक कुठून आणि कशी आली?2. ही घटना आत्महत्येचा प्रयत्न आहे की इतर कोणताही संशयास्पद प्रकार?3. गावठी कट्टा कुणी पुरवला? यामागे कोणते जाळे कार्यरत आहे का?4. घटनेपूर्वी समीरने कुणाशी संपर्क साधला होता का? मोबाइल कॉल रेकॉर्डमध्ये काही संशयास्पद आढळते का?
शहरात भटक्या कुत्र्यांनी वर्षभरात 5700 जणांचे लचके तोडले. त्यामुळे सर्व भागातील नागरिक भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मागणी करत आहेत. नागरिकांची ओरड लक्षात घेत मनपाच्या पशुसंवर्धन विभागाने एक अधिकृत 9421664514 क्रमांक जारी केला. याबाबत अनेक नागरिकांनी प्रत्यक्षात गाडी येत नसल्याच्या तक्रारी केल्या. याची दखल घेऊन ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने दोन वेगळ्या क्रमांकावरून तक्रारी करून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. त्यात काही वेळा फोन उचललाच गेला नाही. उचलला गेल्यावर काही वेळाने कॉल करण्याचे सांगण्यात आले, तर काही वेळा गाडी येऊन गेली असे उत्तर मिळाल्याचे समोर आले आहे. केस 1 : राजाबाजारप्रतिनिधी : राजाबाजारमध्ये कुत्र्यांची समस्या आहे. नागरिक भयभीत आहेत.डॉग कंट्रोल रूम : राजाबाजारमध्ये नेमके कुठे ? नेमके ठिकाण सांगा.प्रतिनिधी: संस्थान गणपती भागातडॉग कंट्रोल रूम : तुमचे नाव काय?प्रतिनिधी : नाव सांगितले, मोबाइल क्रमांक देऊन प्रतिसादाची विनंती केली.डॉग कंट्रोल रूम : उद्या गाडी येईल.प्रत्यक्षात : चार दिवस उलटून गेले. केस 2 : सातारा परिसर (दुपारी फोन केल्यावर उचलला गेला नाही. संध्याकाळी पुन्हा फोन केल्यावर उचलला गेला.)प्रतिनिधी : सातारा येथे कुत्रे आहेत.डॉग कंट्रोल रूम : बरं, बरं.. उद्या सकाळी फोन करा. नंतर बघू.प्रतिनिधी : आता काय अडचण आहे? आता मदत करा ना.डॉग कंट्रोल रूम : आता वेळ होऊन गेली. सकाळी करा, गाडी पाठवतो. केस 3 : मयूर पार्कप्रतिनिधी : मयूर पार्क भागात मोकाट कुत्र्यांची संख्या खूप झाली आहे.डॉग कंट्रोल रूम : गाडी आली होती. सर्जरी झालेले कुत्रे उचलत नाही.प्रतिनिधी : अहो, पण फिरायला गेल्यावर ते अंगावर धावून येतात.डॉग कंट्रोल रूम : मयूर पार्कमध्ये कोणत्या भागात? नेमके ठिकाण सांगाप्रतिनिधी : गार्डन परिसरात.कंट्रोल रूम : हा तिकडे पण गेलो होतो, प्रत्यक्षात झोननिहाय एक व्हॅन गरजेची शहरात 10 झोन आहेत. या प्रत्येक झोनमध्ये एक व्हॅन असल्यास कुत्र्यांची समस्या सोडवली जाऊ शकते. तसेच एका गाडीवर किमान 3 ते 5 कर्मचारी कार्यरत असणे गरजेचे आहे. त्यानंतरच ही समस्या मार्गी लागू शकते, असे कर्मचाऱ्यांनी खासगीत सांगितले. थेट सवाल शाहेद शेख, पशुसंवर्धन अधिकारी, मनपा फोन केल्यावर नीट उत्तरे मिळत नाहीत...असे काहीही नाही. जर काही ठिकाणी असा प्रकार घडला असेल तर थेट मनपात तक्रार करावी. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.किती दिवसांत गाडी जाणे अपेक्षित आहे ?लवकरात लवकर गाडी पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यासाठी गाडीचे विभागवार नियोजन केलेले असते. त्यानुसार गाडी जाते.भटक्या कुत्र्यांसाठी काय धोरण तयार केले?: प्रशासकीय पातळीवर अनेक प्रस्ताव तयार केले. अर्थसंकल्पातही निधीची तरतूद केली आहे.
नाला साफसफाईला पालिकेची नकारघंटा:उपजिल्हा रुग्णालयालगतच्या नाल्यात कचरा
येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयालगत वाहणारा मोठा नाला कचऱ्याने भरला आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने कचरा कुजून पाणी तुंबून आहे. यामुळे डांस व इतर किटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. बाजूलाच उपजिल्हा रुग्णालय असल्याने नाला स्वच्छतेला प्राधान्य गरजेचे आहे. यापूर्वी स्वच्छता अभियानांतर्गत हा नाला स्वच्छ केला होता. या नाल्याकडे पालिकेने लक्ष दिले नाही. हा नाला हा प्रभाग क्र.९ मध्ये येत आहे. स्वच्छतेसाठी मुख्याधिकाऱ्यांना १५ जानेवारीला नगरसेवक निलेश शर्मा यांनी निवेदन दिले होते. परंतु त्याची दखल घेतली नाही. प्रभाग क्र.९ मधील दोन नगरसेवक विरोधी बाकावर असल्याने मुद्दाम दुर्लक्ष करण्यात येत असल्याची चर्चा आहे. प्रभाग क्र.९ मधील शासकीय रुग्णालयाला लागुन असलेला नाला हा गोरक्षण संस्थानपर्यंत जातो. हा नाला कचऱ्याच्या ढिगाऱ्याने बुजला आहे. १५ जानेवारीला लेखी निवेदन देऊन मुख्याधिकारी, आरोग्य विभाग अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. परंतु २ महिन्यांपासून त्यांनी लक्ष दिले नाही. नगरपरिषद प्रशासनाचा कारभार सुस्त आहे. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्रिमूर्ती बुद्ध विहार या नाल्याजवळच आहे. त्यामुळे जनसामान्यांच्या भावना लक्षात घेत दुर्गंधी व आरोग्याबद्दल तक्रारी दूर करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी व ठाणेदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. दिरंगाई झाल्यास त्रिमूर्ती नगरात उपोषण व पालिका इमारतीत कचरा फेक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक निलेश शर्मा यांनी दिला आहे.
अकोट तालुक्यात राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत (टप्पा-१) चोहोट्टा बाजार येथे आयोजित शिबिरात नागरिकांच्या तक्रारींचा पूर आला. परंतु अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने समस्यांवर अपेक्षित तोडगा निघाला नाही. त्यामुळे आमदार रणधीर सावरकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. हे समाधान शिबिर आहे की असमाधानाचा मेळावा, असा सवाल करत ‘माझ्या मतदारसंघात काम करायचे असल्यास बदलीचे अर्ज करुन घ्या’, असा इशारा दिला. नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा त्यांच्या दारी उपलब्ध करण्यासाठी समाधान शिबिर घेण्यात येते. तक्रारींचे तत्काळ निवारण करत नागरिकांना डिजिटल ७/ १२, ८-अ उतारे, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी व जात प्रमाणपत्र, अकृषक परवानगी आदी सेवा एकाच ठिकाणी देण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात नागरिकांची प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/ १२ मधील त्रुटी, विविध प्रमाणपत्रांची कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांनी शिबिराला दांडी मारल्याने नागरिकांची गैरसोय वाढली. त्यामुळे आमदार रणधीर सावरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ‘माझ्या मतदारसंघात काम करायचे नसेल, तर बदलीचे अर्ज करून घ्या, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही शिबिरे घेतली जातात, अधिकारी उपस्थित नसतील तर या उपक्रमांचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी विचारला. दरम्यान, शिबिरांमध्ये अधिकारी दांडी मारत असल्याने योग्य मार्गदर्शन मिळत नाही. तसेच कामे अडकून पडतात, अशी व्यथा नागरिकांनी मांडली. महसूल सेवेच्या सुलभतेसाठी समाधान शिबिर उपक्रम सुरू केला. परंतु चोहट्टा बाजार येथील शिबिरात प्रशासनाची कार्यक्षमता उघड पडली. पीकविमा, शेतरस्ते, पाणी व वीज प्रश्न का सुटत नाहीत? जात, उत्पन्न, रेशन व इतर प्रमाणपत्रे वेळेत का मिळत नाहीत, डिजिटल सेवा असूनही नागरिकांना फेऱ्या का, आलेल्या अर्जांपैकी किती निकाली काढले,जबाबदारांवर कारवाई होणार का, आदी प्रश्नांकडे लक्ष लागले आहे. नागरिकांचा आरोप, शिबिर म्हणजे दिखावा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये संताप आहे. शिबिर म्हणजे केवळ दिखावा, असा आरोप नागरिकांनी केला. अर्ज घेतले जातात, परंतु त्यावर काहीच होत नाही. गतवर्षीही असेच झाले होते. यंदाही काहीच बदल झाला नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी व उपस्थितांनी दिल्या. शिबिरातील अव्यवस्था व प्रलंबित कामांमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केल्याने आमदार रणधीर सावरकर यांनी हे शिबिर पुन्हा घेणार, अशी ग्वाही दिली. हे शिबिर अपेक्षेप्रमाणे झाले नाही, याबाबत त्यांनी शेतकरी व नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली. योग्य नियोजनासह हे शिबिर पुन्हा घेण्यात येईल. शिबिरात प्रत्येक अर्जावर निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिबिराबाबत प्रसिद्धी केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गावपातळीवर दवंडी दिली नाही, माध्यमांना अधिकृत माहिती दिली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनाही वेळेत कळवले नाही. यामुळे अनेक नागरिक या शिबिराबाबत अनभिज्ञ राहिले. काहींना शेवटच्या क्षणी माहिती मिळाल्याने ते आवश्यक कागदपत्रांशिवायच उपस्थित राहिले, परिणामी त्यांची कामे होऊ शकली नाही.
एकविसाव्या शतकात जगातील प्रत्येक गोष्ट तळहातावर उपलब्ध झाली असून सकारात्मक दृष्टिकोनातून ही प्रचंड मोठी उपलब्धी आहे. याच्या सुयोग्य वापरासाठी संस्कारक्षम पिढी घडवणे, ही आजच्या मातृ शक्तीची प्राथमिकता असावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेच्या व्यवस्थापकीय संचालक वर्षा लढ्ढा (उंटवाल) यांनी केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शनिवारी २८ विदर्भस्तरीय महिला सक्षमीकरण मेळावा व स्त्रीशक्ती उत्सव घेण्यात आला. स्त्री-पुरुष समानतेच्या या काळात व्यावसायिक व प्रशासकीय क्षेत्रात महिलांनी केलेली प्रगती भूषणावह आहे हे सांगताना वर्षा लढ्ढा यांनी शेती क्षेत्रातील महिलांच्या योगदानातूनच आपण अन्नधान्य उत्पादनात आघाडीवर असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी वर्षा मीना, परिविक्षाधीन जिल्हा पोलिस अधीक्षक ईशानी आनंद यांनी मार्गदर्शन केले. पुरस्कार सोहळ्याचे आयोजक विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, संशोधन संचालक डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी डॉ. देवानंद पंचभाई, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. मुरली इंगळे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे आदींची उपस्थिती होती. महिला सक्षमीकरण मेळावा वा स्त्री शक्ती उत्सवाचे आयोजनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी मार्गदर्शन केले. विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे विलास वाशीमकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वर्षा खोब्रागडे, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक नरेंद्र काकड यांच्यासह डॉ. उमेश चिंचमलातपुरे, प्र. संजीवकुमार सलामे, डॉ. सुहास मोरे, डॉ. प्रकाश घाटोळ, प्रा. कृतिका गांगडे, दिलीप तिरपुडे, सुनीता राठोड, बाळकृष्ण झगरे, ओमकार सोनकर, योगेश मानकर, नरेश डोंगरे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. १५ मातृशक्तीचा सन्मान कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, मावीम व डीआरडीएच्या सहयोगातून झालेल्या सोहळ्यात रसिका मारगाये, रेखा वंजारी, माधुरी वडतकर, विजयालक्ष्मी मानकर, रवीना पुराम, प्राची मिरासे, सावित्रीबाई फुले महिला उत्पादक गट, प्रतिभा तायडे, मीना जाधव, उषा देशमुख, शालिनी वानखेडे, शिल्पा बुरड, श्रुती बालिंगे, अरुणा बनसोड, राधा पागृत यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोंदू अशोक खरात प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भोंदू खरातला मदत करणाऱ्या सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकरांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांचा पक्ष तटकरे व चाकणकरांमुळे बदनाम झाला आहे. दादा आज असते तर त्यांनी हे अजिबात सहन केले नसते. त्यामुळे खरातला आधार व पाठबळ देणाऱ्यांना तुम्ही अभय देऊ नका, असे शरद पवार गटाने आपल्या पत्रात म्हटले आहे. शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते व संघटक सचिव विकास लवांडे यांनी हे पत्र लिहिले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या कार्यालयाला मी आज ईमेल द्वारे हे निवेदन पाठवलेले आहे. त्यानुसार आपण तातडीने कार्यवाही कराल अशी अपेक्षा आहे. अशोक खरात यांनी जे विविध गुन्हे केलेले आहेत ते गंभीर स्वरूपाचे असून ते एकट्याने केलेले नाहीत त्याची मोठी टीम त्याच्यासोबत होती. श्री शिव निका संस्थानच्या तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या विश्वस्त सदस्य होत्या. सुनील तटकरे रूपाली चाकणकर तसेच इतर सर्व विश्वस्त यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वेळोवेळी अशोक खरातला मदत केल्याच्या कारणास्तव त्यांना सहआरोपी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. त्यांना अटक करावी ही विनंती तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनींना नम्र विनंती की आदरणीय अजितदादांचा NCP पक्ष तटकरे आणि रूपाली चाकणकर यांच्यामुळे बदनाम झाला आहे. अजित दादांनी कदाचित हे सहन केले नसते. अशोक खरातला त्यांनी राजकीय आधार देऊन पाठबळ दिलेले होते. त्यांना आपण अभय देऊ नये ही विनंती, असे लवांडे यांनी म्हटले आहे. खाली वाचा शरद पवार गटाचे पत्र जशास तसे विकास लवांडे आपल्या पत्रात म्हणतात, सिन्नर जिल्हा नाशिक येथील अशोक खरात प्रकरणात अनेक वेगवेगळे गुन्हे दाखल होत आहेत. मात्र अशोक खरात प्रमुख असलेल्या देवस्थान ट्रस्टमध्ये विश्वस्त असलेल्या रूपाली चाकणकर व इतर विश्वस्तांवर अद्याप गुन्हे दाखल झालेले नाहीत. अशोक खरात ही एक मोठी टोळी आहे. त्याची जी विविध प्रकरणे बाहेर येत आहेत, विविध गुन्हे दाखल होत आहेत हे सर्व कारनामे तो एकटा करू शकत नाही. अद्याप पर्यंत इतर कोणत्याही आरोपींवर गुन्हे दाखल झालेले नाहीत त्यामुळे तपासावर संशय निर्माण होत आहे. आपण याप्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही असा विश्वास दिलेला आहे. मात्र रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा दुरुपयोग करून सुनील तटकरे यांच्या सहभाग व साह्याने अशोक खरात यांच्या सोबत विविध आर्थिक व महिला पुरुषांच्या शोषणाची प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी पदाचा दुरुपयोग करून अशोक खरात चे राजकीय पाठबळ देऊन हितसंबंध जोपासलेले आहेत. अशोक खरात यांनी जे विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत त्यात सुनील तटकरे आणि रूपाली चाकणकर यांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे तसे अनेक फोटो व्हिडिओ सार्वत्रिक उपलब्ध आहेत. ते एकमेकांना अनेक वर्षे वारंवार भेटलेले आहेत. त्या तिघांचे गेल्या काही वर्षातले सर्व सीडीआर तपासणी करणे आवश्यक आहे त्यांच्या भेटीगाठी, आर्थिक व्यवहार तपासणी आवश्यक आहे, त्यांची मागील पाच वर्षात वाढलेली बेसुमार मालमत्ता ही कशी वाढली? याचाही तपास केला पाहिजे. अशोक खरातने केलेल्या सर्व गुन्हयात या सर्वांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्याची पाठराखण करून साथ दिलेली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राहून महिलांना न्याय देण्याच्या ऐवजी महिलांवर अन्याय करणाऱ्याला पाठीशी घालण्याचे काम जाणीवपूर्वक रूपाली चाकणकर यांनी केले आहे. सदर प्रकरण अतिशय गंभीर असून महाराष्ट्राच्या प्रतिमेला व सामाजिक स्वास्थ्याला लाजिरवाणे आहे. तथापि अशोक खरात यांचेशिवाय सह आरोपी म्हणून सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर व इतर सर्व विश्वस्तांवर कामगार तसेच संस्थेचा चार्टर्ड अकाउंटंट यांच्यावर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे तशी आमची याद्वारे मागणी आहे. पुरुषांना सुद्धा न्याय मिळणे आवश्यक विकास लवांडे आपल्या पत्रात पुढे म्हणतात, अशोक खरात ही एक मोठी टोळी आहे त्यांच्यावर मकोका कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा कारण इतके असंख्य गुन्हे करणे अशोक खरात एकट्याचे काम नाही त्याची मोठी टोळी आहे त्यामुळे सर्वांवर गुन्हे दाखल करून शेकडो अन्यायग्रस्त महिलांना व आर्थिक फसवणूक झालेल्या पुरुषांना सुद्धा न्याय मिळणे आवश्यक आहे. राज्यातील भोंदूगिरी प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात आहे त्या सर्वांवर स्थानिक पोलिसांच्या मार्फत मोहीम राबवून राज्यात अंधश्रद्धा फैलावणाऱ्या भोंदूगिरीचे बुवाबाजीचे कायद्याने समूळ उच्चाटन करावे. या कामी आम्ही आपल्याला सहकार्य करण्यास तयार आहोत. आपला महाराष्ट्र संत आणि समाज सुधारकांच्या विचारांचा आहे शिव शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा आहे हे आपण यानिमित्ताने दाखवून द्यावे सर्व दोषींवर कायद्याने कडक कारवाई व शिक्षा व्हावी ही विनंती, असे शरद पवार गटाने आपल्या पत्रात म्हटले आहे.
श्री गजानन महाराज मंदिर लक्ष्मीनगर, श्री संत गजानन महाराज संस्थान रेणुकानगर, श्री राम मित्र मंडळ बोरगाव मंजू यांच्या वतीने आयोजित श्रीरामनवमी उत्सव धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरण व पारंपरिक धार्मिक विधीने उत्साहात पार पडला. शहरातील मुख्य मार्गावरुन नगरप्रदक्षिणा घालून ग्रामस्थांनी उत्सवात भाविकांनी श्रद्धेने सहभागी होत पूजन केले. संत गजानन महाराज मंदिर लक्ष्मीनगर, संत गजानन महाराज संस्थान रेणुकानगर, श्रीराम मित्र मंडळ सार्वजनिक मिरवणूक सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान संत गजानन महाराज, प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीता माता यांच्या मूर्ती स्थापन करत मिरवणूक काढण्यात आली. चिमुकल्यांनी राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांची रुपे साकारत शोभायात्रेत सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केलेली बालके घोड्यावर बसून सहभागी झाले होते. भजनी दिंड्यांचा सहभाग उत्सवात भजनी दिंड्यांचा सहभाग होता. दिंड्या टाळ, वीणा, मृदंग, संत वाङ्मय, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि एकनाथी भागवत या सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडले. वारकरी परंपरेला भाविकांसाठी विशेष पर्वणी ठरली. बोरगाव मंजूसह पंचक्रोशीतील भाविक या उत्सवात सहभागी झाले. ‘श्रीं’च्या कृपेने भाविकांची सेवा घडली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मूर्तिजापूर पोलिस उपविभागीय अधिकारी वैशालीताई मुळे, ठाणेदार अनिल गोपाळ, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र धुळे, मनोज उघडे, ज्ञानेश्वर लांडे, बोरगाव मंजू, मूर्तिजापूर पोलिस प्रशासनाने यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
संतांनी जातीव्यवस्थेचा छेद करून समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. संत परंपरेत जातीव्यवस्थेला कोणताही थारा नसल्याचे हभप राजेंद्र महाराज वकटे म्हणाले. ते डाबकी रोडच्या कर्ता हनुमान मंडळाच्यावतीने वानखडे नगर येथे सुरू असलेल्या संगीतमय शिवपुराण कथेत मार्गदर्शन करीत होते. पाळोदी येथील कथाकार हभप राजेंद्र महाराज वकटे हे पुढे म्हणाले की, काही ठिकाणी नदी तीर्थ आहे, तर कोठे सरोवर तीर्थ आहे. काही ठिकाणी समुद्र तीर्थ आहे, कोठे विहीर तीर्थ आहे, तर कोठे तलाव तीर्थ आहे. समुद्राला सर्व तीर्थे मिळतात म्हणून अशा समुद्रात स्नान करणे म्हणजे तीर्थाचे फळ प्राप्त करणे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या शिव कथेत त्यांनी मनुष्याच्या वर्णाचा उहापोह केला. ते म्हणाले, मरेपर्यंत जे मनातील जात नाही त्याला जात म्हणतात. या जातीव्यवस्थेचा संतांनी छेद करून समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. संत परंपरेत जातीव्यवस्थेला कोणताही थारा नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मनुष्य आपल्या कर्माने श्रेष्ठ होतो तो वर्णाने होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. संचालन गजानन धरमकर यांनी केले. गुरुवार. २ एप्रिलपर्यंत नित्य सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत आयोजित या कथेचा लाभ घेण्याचे आवाहन हनुमान मंडळाचे अध्यक्ष सुभाष म्हैसने, माजी नगरसेविका मंगला म्हैसने, विठ्ठलराव चिकटे, वसंत जायदे, शरद कोकाटे, विलास आगरकर, गजानन धरमकर, अनिल गावंडे, चंद्रकांत ताठे, प्रभाकर ठाकरे, संजय देशमुख, वसंत माळी, संजय वैद्य, संतोष जाधव, सचिन तायडे,संजय बहाळ, उजाडे,रमेश येरेकर, निखिल नहाटे, प्रल्हाद शेळके, महादेव खडसाडे,भागवत गिरी, राजू टेकाडे,शंकरराव देशमुख, लक्ष्मण मोरे, गजानन चिपडे, अशोक भिलकर, मोहनसिंग सिसोदिया, दीपक चतर,अनुराग आठवले, विलास वानखडे, तानाजी देवकते, अॅड. संतोष घोडे, अरुण साबळे, भिकूलाल पोपट, गजानन माळी, विनोद तायडे, रामेश्वर लांडगे, राजेंद्र मालानी, रामेश्वर खडसे, गोपाल साबळे, सोनू देशमुख, मोहन पाटील, संतोष वानखडे, ओम प्रकाश चांडक, हिम्मतराव पोहरे, मधुकर अंधारे, सांगून वेडे, प्रमोद भटुरकर, डॉ सुरेश नागे, विजय आकोटकर, संतोष गावंडे, हरिभाऊ लबडे, महादेवराव ढवळे, रमेशराव गवळी, जयसिंग तवर, विनोद नागे, संजय खुणे, ओमप्रकाश चांडक, कमल अग्रवाल, नितीन नळकांडे, रमेशराव काळे, तुकाराम उजाळे, सुधाकर इंगोले, समाधान वानखडे, प्रकाश गावंडे, आर. एस. थिटे, सूर्यप्रकाश गावंडे,निवृत्ती मानकर समवेत कर्ता हनुमान मंडळ,महिला भजनी मंडळ,विशेष सहकार्यकर्ते व सेवाधारी वर्गाने केले. धार्मिक अनुष्ठानात तिर्थक्षेत्रांना मोठे महत्व आपल्या परंपरेत व धार्मिक अनुष्ठानात तिर्थक्षेत्रांना मोठे महत्व आहे. काही ठिकाणी केवळ तीर्थ असते तर क्षेत्र नसते. काही ठिकाणी क्षेत्र असते तर तीर्थ नसते. मात्र यात जे तीर्थ व क्षेत्रही आहे. अशा पावन तीर्थक्षेत्री जाणे गरजेचे आहे. वर्षातून एकदा अश्या तिर्थक्षेत्रात गेल्यावर जीवनाचे सार्थक होत असल्याचा हितोपदेश हभप राजेंद्र महाराज वकटे यांनी केला.
अकोली खुर्द येथील मूळ रहिवासी आणि भारतीय सैन्य दलातील नायक सुशील दिलीप तेलगोटे (२७) हे सात दिवसांच्या सुटीवर घरी आले असताना २४ मार्च रोजी ते गावातील मित्रांसमवेत पार्टी करायला बाहेर गेला होता. यावेळी मद्याच्या नशेत तर्र तिघा-चौघा मित्रांनी दारु पिण्याच्या किरकाळ कारणावरून वाद घालत केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा अकोला शहरातील एका खासगी रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून त्याच्या चौघा मित्रांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जवानावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत जवानाचे वडील दिलीप दयाराम तेलगोटे यांनी जुने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, त्यांचा मुलगा सुशील तेलगोटे, जो भारतीय सैन्यात कार्यरत होता. तो नुकताच सुटीवर घरी परतला होता. २४ मार्चच्या रात्री तो काही मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी अकोली बुद्रुक शिवारात बाहेर गेला होता. यादरम्यान, त्याच्या मित्रांनी दारुच्या नशेत काही कारणास्तव वाद घालून त्याच्यावर लाकडी फायटरने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुशीलला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जुने शहर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १०९, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यशवंत उर्फ गोलू गणेश ठाकूर (२७, रा. अकोली खुर्द), जय विनोद मोरेकर (२७, रा. अकोली), बाळा धुमाजी सोलापुरे उर्वरित पान ४ अकोला| बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रिधोरा गावातील एका शेतात २६ मार्च रोजी दुपारी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. गुन्हे शाखेच्या तपासात असे उघड झाले की, पीडित तरुणाच्या दोन मित्रांनी दारुच्या नशेत हत्या करून त्याचा मृतदेह शेतात फेकून दिला होता. मृत तरुणाचे नाव सचिन वाल्मीक खंडारे (२९, अमानतपूर तकोडा, ता. बाळापूर) असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने लावलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि तपास सुरू करण्यासाठी बाळापूरचे एसडीपीओ, पोलिस निरीक्षक आणि अकोला गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सुरुवातीला मृताची ओळख पटवण्याचे काम केले. मृताच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची चौकशी केल्यानंतर, गुन्हे शाखेने जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून असे उघड झाले की, मृत सचिन आणि त्याचे दोन मित्र, आदेश सुधीर डोंगरे (२४) आणि अभिषेक प्रकाश गवळी (२४, रा. हातरुण, ता. बाळापूर) हे मोटारसायकलवरून कुठेतरी जाताना दिसले होते. गुन्हे शाखेने त्यांचा शोध घेण्यासाठी तत्काळ दोन पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली.हत्येनंतर, दोन्ही आरोपी वेगवेगळ्या दिशेने फरार झाले. गुन्हे शाखेने दर्यापूर येथून अभिषेक गवळी आणि भुसावळ येथून आदेश डोंगरे यांना अटक केली. दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाला होता. अटकेनंतर त्यांना बाळापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, सहायक पोलिस निरीक्षक विजय चव्हाण, उपनिरीक्षक गोपाळ जाधव, विष्णू बोडखे, मजीद पठाण, मजीद कोनसेन शेख उर्वरित पान ४ अकोली गावातील मित्रांनीच पार्टीच्या वेळी मद्यधंुद अवस्थेत केलेल्या हल्ल्यानंतर मृत्युमुखी पडलेला जवान सुशील दिलीप तेलगोटे हा भारतीय सैन्य दलात १८ महार रेजीमेंटमध्ये कारगील येथे ‘नायक’ पदावर कार्यरत होता. नुकतीच त्याची बदली कारगीलहून मध्य प्रदेशातील सागर येथे नव्यानेच स्थापन झालेल्या भैरव बटालियनच्या ‘एमआरसी’ येथे झाली होती. तेथे रुजू होण्याआधी आठवडाभराची सुटी घेऊन तो अकोला शहराचाच एक भाग असलेल्या अकोली या आपल्या मूळ गावी आला होता. मित्रांसमेवत २४ मार्चच्या रात्री तो पार्टी करण्यासाठी गेला होता. तेथे काही कारणावरून मित्रात वाद झाला आणि या वादात जीव गमवावा लागला. या जवानाच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि एक दोन वर्षाचा मुलगा आहे. जवान सुशील तेलगोटे हा कुटुंबातील एकुलता एक होता. अंत्यसंस्कारावेळी त्याची पत्नी रोशनी आणि आई यांचा आक्रोश हृ्दय हेलावून टाकणारा होता. अंत्यसंस्कारवेळी भारतीय सैन्य दलातील अधिकारी व सहकारी जवान उपस्थित होते. त्यांनी सैन्य दलातर्फे बंदुकीच्या फेरी झाडून जवानाला अखेरची मानवंदना दिली.‘शहीद सुशील तेलगोटे’अमर रहे, भारत माता की जय’च्या घोषणांनी अकोली परिसर दणाणून गेला होता.
उन्हाळा सुरू झाला की, खवय्यांना गोड-आंबट मधूर चवीच्या आंब्याची आठवण होते. यंदा रमजान व चैत्र नवरात्रोत्सवाच्या काळात आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे त्यांचे दरही १८० ते २०० रु. किलोपर्यंत वाढले. बैगनपल्ली, लालबाग (लालपट्टा) या प्रकारातील आंबे शहरात आल्यानंतर नागरिकांनी ते उत्साहात खरेदी केले. शहरातील चौकांमध्ये चिल्लर आंबे विक्रेते सध्या मोठया टोपल्यांमध्ये आंबे सजवून विक्रीसाठी बसलेले दिसत आहे. जवळून गेल्यानंतर आंब्याचा सुगंध कोणालाही आकर्षित करीत आहे. गांधी चौक, चित्रा चौक, रवीनगर चौक, इतवारा बाजार, टांगापडाव, शुक्रवार बाजार, पंचवटी चौक, शेगांव नाका चौक येथे आंबा विक्रेत्यांनी मोक्याच्या जागा हेरून विक्री सुरू केली आहे. विक्रेत्यांच्या दुकानांपुढे ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. रमजान ईदेच्या काळात इफ्तारमध्ये फ्रुट सॅलड बनवण्यासाठी तसेच चैत्र नवरात्रोत्सवात देवीला अर्पण करण्यासोबतच अनेकांना उपवास असल्यामुळे त्यांनी आंब्याच्या खरेदीवर जोर दिला.तसेच तापमान वाढल्यामुळे आंब्याचा रस, शेक, आम्रखंड खाण्याकडे कल राहिल्याने आंबे महाग असतानाही त्यांची ठोक व चिल्लर खरेदी झाली. सध्या आंब्याची आवक ही कमी आहे. त्यामुळे चिल्लर बाजारात ते १८० ते २०० रु. किलो दराने मिळत आहेत. एप्रिल महिन्यात कोकण व चेन्नईतून हापूस, दशेरी, लंगडा व तोतापरी या प्रकारातील आंबे शहरात दाखल होतील. त्यानंतर साहजिकच आंब्याचे दर कमी होतील, अशी माहिती आंब्याचे ठोक व्यापारी दिलीप वाठ यांनी दिली. एप्रिल महिन्यात आंब्याचे दर होणार कमी
कष्ट, नाविन्य आणि आपसात उत्कृष्ट समन्वय या आधारे यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घातले. याचे उत्तम उदाहरण येथील एकनाथराव रानडे यांच्या नावाने असलेली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) होय. महाराष्ट्रातील सर्व आयटीआयमध्ये या संस्थेने थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सदर यशामुळे अमरावती जिल्ह्याची मान अधिक डौलाने उंचावली आहे. राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी राज्यभर एक स्पर्धा राबवण्यात आली होती. त्या स्पर्धेतून राज्यस्तरीय उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था निवडण्यात आल्या. शुक्रवारी २७ मार्च रोजी हा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्कारासाठी नांदगावच्या आयटीआयची निवड करण्यात आली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात केलेल्या कामकाजाच्या आधारे ही निवड करण्यात आली. एवढेच नव्हे तर प्रशस्तीपत्रासह पुरस्कारस्वरुप २ लाख रुपयांची रोख मदतही करण्यात आली. सदर संस्थेतील प्राचार्य, निदेशक आणि विद्यार्थी यांच्यात योग्य सांगड आहे. त्यामुळे नाविन्यपूर्ण उपक्रम, अत्याधुनिक सुविधा आणि १०० टक्के प्रवेश क्षमता हे उद्दीष्ट दरवर्षी गाठले जाते. शिवाय अभ्यासक्रम पूर्ण करण्यासोबतच प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येतो. या संस्थेत स्मार्ट क्लासरूम, सर्वत्र सीसीटीव्हीची निगराणी, खेळाचे मैदान, जिम, शुद्ध पाण्याची व्यवस्था अशा विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. तत्कालीन सहसंचालक प्रदीप घुले व विद्यमान सहसंचालक अनंत सोमकुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य नंदनसिंह भुकवाल यांच्या नेतृत्वात ही प्रगती साध्य झाली आहे. तत्कालीन कर्मचारी व सद्याचे शिल्पनिदेशक-कर्मचारी तथा प्रशिक्षणार्थ्यांचे सहकार्य आणि सातत्यपूर्ण उपक्रम यामुळेच हा पुरस्कार मिळू शकला. एका अर्थाने हा सन्मान संस्थेतील सर्वांनी समुहाने केलेल्या कामाचा आहे, अशी प्रतिक्रिया प्राचार्य नंदनसिंह भुकवाल यांनी व्यक्त केली. या यशाबद्दल प्रभारी प्राचार्य सुरेश मेंढे, शिल्प निदेशक तुषार जैन, राजकुमार धोटे, प्रफुल्ल कचरे, वैभव जाधव, निलेश देऊळकर, राम इखार, शहजाद खान, सुशिल सरोदे, सागर डांगे, चिन्मय दहाट, वैभव केणे, प्रशांत पोच्ची, सचिन वाहणे, सचिन दुवदने, मयुरी वसुले, रूचिका डोरस, संगिता बिबेकर, दिपाली लोखंडे, रूपाली लांडे, कार्यालयीन कर्मचारी अनंत खेडकर, निलेश खंडार, मनोज पकडे, राजकुमार कांबळे, गौरव मोगरे व प्रशिक्षणार्थ्यांनी आनंद व्यक्त करत संस्थेचे अभिनंदन केले. ही कामगिरी नांदगाव खंडेश्वरसाठी अभिमानाची ठरली असून भविष्यात आणखी मोठी झेप घेण्याचा संस्थेचा निर्धार आहे. सदर संस्थेला यापूर्वीही काही अव्वल पुरस्कार मिळाले आहेत. २०२१-२२ मध्ये नांदगाव खंडेश्वर आयटीआयला विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामकाजाचा प्रथम पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २०२४ मध्ये मुंबईतील डिपेक्स राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनातही आयटीआय गटातून ‘शेतकरी मित्र’ यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला होता. विभागीय आणि राज्यस्तरावर सलग पुरस्कार पटकावणारी जिल्ह्यातील ही एकमेव आयटीआय ठरली आहे. शेतकरी यंत्रालाही मिळाला होता प्रथम पुरस्कार
विद्यापीठ आणि कर्मचारी यांच्यातील नाते निष्ठेच्या दृढ धाग्याने बांधलेले असते. कर्मचाऱ्यांनी समर्पण, त्याग, श्रद्धा आणि प्रामाणिकपणाने दिलेल्या सेवेमुळे विद्यापीठ त्यांचे सदैव ऋणी राहील, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित ‘कर्तव्यपूर्ती सोहळ्या’त अध्यक्षस्थानावरून शुक्रवारी (दि. २७) ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही.एच. नागरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, उपकुलसचिव तथा प्रभारी वित्त व लेखा अधिकारी मंगेश वरखेडे, कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे, उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील, कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांसह मान्यवर उपस्थित होते. कुलगुरू डॉ. बारहाते यांनी सांगितले की, विद्यापीठाची ओळख त्याच्या वैविध्यपूर्ण कार्यपद्धतीत असून कर्मचारी प्रामाणिकपणे व निष्ठेने आपली जबाबदारी पार पाडतात. त्यांच्या या गुणांमुळे त्यांनी केवळ संस्थेचीच नव्हे तर स्वतःच्या कुटुंबाचीही प्रगती साधली आहे. त्यांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अनिल काळबांडे, अनिल काळे, माधव वारके, मुरलीधर चिलुरकार व किशोर गजघुमे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या सहचारिणींचाही साडी-चोळी व कुंकवाच्या करंड्याने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या दीर्घ सेवाकाळातील कार्याची प्रशंसा करून त्यांना निरोगी व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्तींनीही आपल्या मनोगतात सहकाऱ्यांकडून मिळालेल्या प्रेम व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्यावतीनेही सत्कारमूर्तींना भागभांडवलाचा धनादेश व पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने झाली. प्रास्ताविक डॉ. अविनाश असनारे यांनी, सूत्रसंचालन डॉ. विलास नांदुरकर यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. धनंजय पाटील यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती. कर्मचारी प्रामाणिकतेचे प्रतीक : डॉ. नागरे विद्यापीठातील कर्मचारी अत्यंत प्रामाणिक व निष्ठावंत आहेत. आपले कार्यस्थळ हेच आपल्या उपजीविकेचे खरे साधन असल्याची जाणीव ठेवून ते काम करतात. कर्मचारी निवृत्त होतो तो केवळ सेवेतून, कर्तव्यातून नाही, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी डॉ. व्ही.एच. नागरे यांनी केले.
येथील चारगड धरणावरून पाण्याची उचल करुन ते १९ गावांना पुरवण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे ३५ कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली. परंतु कंत्राटदाराची देणी रखडल्याने मध्येच या योजनेचे काम बंद झाले. परिणामी १९ गावांतील नागरिकांची प्रतीक्षा यावर्षीही पूर्ण होऊ शकली नाही. केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये १९ गावांना पाणी पुरवणारी ही योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेद्वारे परिसरातील १९ गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात या योजनेचे काम गेल्या एक वर्षांपासून पूर्णपणे ठप्प झाले आहे. कंत्राटदाराची बिले प्रलंबित राहिल्याने त्यांनी काम बंद केले आहे. दरम्यानच्या काळात काही प्रमाणात पाइपलाइन टाकणे व इतर बांधकामे पूर्ण झाली असली तरी उर्वरित कामे रखडलेली आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली असून त्या गावांतील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिलांना व ग्रामस्थांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. दुसरीकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष वेधावे, अशी नागरिकांची मागणी आहे. निधी अनुपलब्ध म्हणून काम बंद एकोणवीस गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे काम अर्धवट अवस्थेत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत केंद्राचा निधी उपलब्ध नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरची बिले प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांनी काम बंद केले आहे,अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता अर्जुन भुंबर यांनी दिली.
शहिदांच्या स्वप्नातील भारत घडवायचा असेल, तर देशहिताचे कार्य करावे लागेल, राष्ट्रीय एकात्मता, देशाची विविधता जपावी लागेल, वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवावा लागेल आणि त्यासाठी बुध्दी प्रामाण्यवादी व्हावे, अनुकरण व्हावा, पण अंधानुकरण नाही, असे मौलिक विचार प्रा. मधुकर जाधव यांनी मांडले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद दिनानिमित्त ‘शहीदांच्या स्वप्नातील भारत’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे होते. तर अतिथी म्हणून अधिसभा सदस्य नितीन टाले व कैलास चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. नीलेश कडू, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर उपस्थित होते. विषयाची मांडणी करतांना प्रा. जाधव म्हणाले, लाला लजपतराय यांच्या विचाराचा भगतसिंह यांच्यावर मोठा प्रभाव होता. लाला लजपतराय यांच्या अकाली निधनाने ते व्यथित झाले व ज्यांच्यामुळे लाला लजपतराय यांना प्राण गमवावा लागला, त्याचा बदला त्यांनी घेतला. असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यामागे सुध्दा भारतीयांचे विचार ब्रिटीश सरकारच्या कानापर्यंत पोहचले पाहिजेत, हा हेतू होता. वस्तुत: जीवितहानी करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. चंदनसिंहसारख्या ब्रिटीशांची चाकरी करणा-यालासुध्दा मारण्यात आले होते. भगतसिंह यांनी स्वत:ला अटक करवून घेतल्यानंतर कारागृहामध्ये सुध्दा भारतीयांना दुय्यम वागणूक दिल्या जात होती, त्यासाठी त्यांनी कारागृहातच उपोषण आंदोलन सुरू केले होते. ब्रिटीश काळात प्रत्येक बाबींसाठी भारतीयांना आंदोलन करावे लागत होते. बाबू गेणू यांनीसुध्दा भारतातील कच्चा माल ब्रिटिशांना नेण्यास मनाई केली होती. या सर्व बाबींवरुनच क्रांतिकारक, समाजसुधारकांनी देशासाठी किती लढा दिल,ा हे स्पष्ट होते. त्यामुळे आजच्या युवकांनी आपल्या ज्ञान कौशल्याचा उपयोग समाजहित, देशहितासाठी करावा. शहिदांचे चरित्र वाचा, विचार आत्मसात करा. ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत रहा, नक्कीच यशस्वी व्हाल, असा सल्लाही प्रा. जाधव यांनी दिला. प्रास्ताविक डॉ. राजीव बोरकर यांनी, सूत्रसंचालन भगवान किनाके यांनी, तर आभार डॉ. निलेश कडू यांनी मानले. व्याख्यान कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी, रा.से.यो. चे कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक विद्यार्थी, विद्यार्थीनी आदी उपस्थित होते. क्रांतिकारकांनी मोठे बलिदान दिले अधिसभा सदस्य नितीन टाले म्हणाले, सर्वस्वाचा त्याग करुन तरूण वयातच क्रांतिकारकांनी देश स्वातंत्र्यासाठी लढा दिला. आपण तरुण वयात काय करीत आहोत, हे पाहिले पाहिजे. आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत, त्यांना सामोरे जा. विद्यार्थी सुध्दा परिवर्तन घडवून आणू शकतात, असेही टाले म्हणाले. कैलास चव्हाण म्हणाले, ब्रिटिशांची सत्ता उलथवण्यासाठी क्रांतिकारकांनी मोठे बलिदान दिले आहे. अवघ्या तेवीस वर्ष वयात भगतसिंह यांनी अनेक पुस्तके वाचली, अभ्यास केला. लाला लजपतराय यांच्याकडून देशभक्तीचे धडे घेतले. पुस्तके वाचा, स्वप्न पहा आणि पुढे जा असे आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.
अकोला प्रबोधन वारी समितीतर्फे ‘छत्रपती ते घटनापती’, या प्रेरणादायी विषयावर प्रबोधन वारी आयोजित करण्याचा संकल्प श्री शिवाजी महाविद्यालयात पार पडलेल्या नियोजन बैठकीत घेण्यात आला. ३ एप्रिल छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी ते १४ एप्रिल घटनापती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील १३५ गावांमध्ये १३५ व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. दोन्ही महामानवांच्या विचारांचा प्रसार करण्याचा व्यापक उद्देश घेऊन ही प्रबोधन वारी निघणार आहे. बैठकीला विविध सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी आणि प्रबोधनकार, व्याख्याते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत प्रबोधन वारीची रूपरेषा, नियोजन, विषयांचे स्वरूप, व्याख्यानांचे वेळापत्रक तसेच प्रत्येक गावातील स्थानिक समन्वयकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. ‘छत्रपती ते घटनापती’, हा विषय निवडण्यामागील उद्देश स्पष्ट करताना आयोजकांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या मूल्यांची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेल्या भारतीय संविधानाच्या तत्त्वांची सांगड घालून समाजात जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. प्रबोधन वारी समितीतर्फे ‘छत्रपती ते घटनापती’, या प्रेरणादायी विषयावर श्री शिवाजी महाविद्यालयात पार पडलेल्या नियोजन बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर. प्रबोधन वारीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन ^छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या स्वराज्याच्या संकल्पनेपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेल्या संविधानिक मूल्यांपर्यंतचा प्रवास एकत्रित करून समाजापर्यंत पोहोचवणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अकोला जिल्ह्यातील १३५ गावांतून हा संदेश पोहोचवत आपण एक सजग, जागरूक आणि विचारशील समाज घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या गावात प्रबोधन वारीचे आयोजन करण्यासाठी संपर्क करा. - अक्षय राऊत, संयोजक-प्रबोधन वारी समिती,अकोला. विचारांचा सेतू निर्माण करण्याचा प्रयत्न स्वराज्य ते सुराज्य या प्रवासातील विचारांचा सेतू निर्माण करून नागरिकांमध्ये कर्तव्य भावना आणि संविधानाबद्दल आदर निर्माण करण्याचा प्रयत्न या वारीतून केला जाणार आहे. प्रबोधन वारीदरम्यान प्रत्येक गावात अनुभवी व्याख्याते छत्रपती ते घटनापती' या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित केली जाणार आहे. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी स्वतंत्र जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही या वारीचा प्रचार केला जाणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सन्मान:शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहू- पालकमंत्री बावनकुळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सत्कार
राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी कायम सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निकाली निघाला आहे. केवळ कर्जमाफी करून चालणार नसून शेतकऱ्यांना त्याच्या शेतीवर निर्भर करून उभे करावे लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्काराचे शनिवारी (दि. २७) आयोजन केले होते. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासह बँकेचे संचालक उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, सहकार क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना सर्व भेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. बँकेने शेतकऱ्यांसाठी विविध ३१ योजना दिल्या आहेत. या योजना परिणामकारकरित्या राबविण्यात येत आहे. सहकार क्षेत्रात अत्यंत चांगल्या पध्दतीचे काम बँक करीत आहे. शेतकरी जगला तरच देश जगू शकणार असल्याने शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. जिल्हा बँकेने १ हजार ४०० कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाचा गैरवापर होणार नाही, यासाठी संचालकांनी कार्य करावे, सहकारी बँका बुडाल्यास सर्वाधिक वेदना शेतकऱ्यांना होतात, याची जाण ठेवावी. त्यामुळे या बँकांचा विकासासाठी पूर्ण सहकार्य आणि मदत करण्यात येईल. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहे. प्रामुख्याने शेतामध्ये जाणारे रस्ते अडवल्यास संबंधित शेतकऱ्यांनी पुढील पाच वर्षे कोणतीही शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. तसेच २०११ पूर्वी सरकारी जागेवर निवासी अतिक्रमण असलेल्या जागांना पंधराशे फुटांचे पट्टेवाटप करण्यात येणार असून एक हजार रुपयात नोंदणी करण्यात येणार आहे, असे सांगितले. यावेळी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापक रमेश बकाल यांनी आभार मानले. पोलिस पाटील यांचा मान्यवरांकडून सत्कार उत्कृष्ट कार्य केलेल्या पोलीस पाटलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून सत्कार करण्यात आला. पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते यावेळी तीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच आमदार राजेश वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री बावनकुळे यांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला.
पक्षाविरोधात वक्तव्य नको; कारवाई करु:कॉँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांनी दिला इशारा
दर्यापूर नगरपालिकेत सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षातील काही नगरसेवकांकडून पक्षाच्या भूमिकेविरोधात वक्तव्ये करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडन केले. गेल्या काही दिवसांपासून काही नगरसेवक विकासकामांबाबत पक्षाची भूमिका चुकीच्या पद्धतीने मांडत असून त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भारसाकळे यांनी केला आहे. शहरातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक दिशाभूल केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. पालिकेच्या प्रशासकीय कालावधीत सुमारे नऊ कोटी रुपयांचा निधी तसेच ‘नमो उद्यान’ संदर्भातील आदेश प्राप्त झाले होते. या अनुषंगाने पालिकेच्या बैठकीत प्रस्ताव सादर करून मंजूर करण्यात आला. मात्र, काँग्रेसमधील काही नगरसेवकांनी हा निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कसाठी वापरावा, अशी मागणी करत पक्षावरच आंबेडकर पार्कला विरोध केल्याचा आरोप केला. यावर स्पष्टीकरण देताना भारसाकळे म्हणाले की, काँग्रेस पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या विरोधात नसून त्या ठिकाणच्या सौंदर्यीकरणासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, नमो उद्यानासाठी सुमारे एक कोटी रुपयांच्या कामास पालिकेच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या विकासकामांबाबतही ठराव मंजूर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून नकारात्मक प्रचार करून पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असून हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. पक्षाविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर पक्षाची आचारसंहिता लागू करण्यात येईल आणि आवश्यक असल्यास अपात्रतेची कारवाईही केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. संबंधितांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष मंदाकिनी भारसाकळे, उपाध्यक्ष अहमद खान पठाण, गटनेते रामेश्वर चव्हाण तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते.गेल्या काही दिवसांपासून काही नगरसेवक विकासकामांबाबत पक्षाची भूमिका चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत.
दक्षिण कशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर स्थित श्री विठ्ठल दर्शनाला कुर्डुवाडीतून जाणाऱ्या भक्तांचा प्रवास धोकादायक बनला आहे. पंढरपूरच्या दिशेने जाणारा कुर्डुवाडी पासून काही अवघ्या काही मीटर अंतरावरच्या ओढ्यावर असलेलं पुलाला मोठ भगदाड पडले आहे. यामुळे काही महिन्यातच सदरील पूल पडण्याची शक्यता असून यावरून वाहन चालक जीव मुठीत घेऊन वाहन चालवत आहेत. सदर धोकादायक पूल भविष्यात मोठ्या अपघाताला आमंत्रण देतोय. सदर खड्ड्याबाबत बघायला माहिती असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील घटनेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. पंढरपूर रोडवर असणाऱ्या ओढ्यावरील पूल सण २०१७ साली बांधला त्यावेळेपासून आजपर्यंत तो धोकादायकच आहे. सदरील भव्य पूल सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुर्डूवाडी यांच्या हद्दीत असताना बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाकडे जबाबदारी ढकलत आहे. पंढरपूर- कुर्डूवाडी रस्ता निकृष्ट दर्जाचा असून याकडे कोणतेच राजकीय मंडळी लक्ष देत नाहीत. यांच्या निकृष्ट कामाचा वाहन धारकांना मोठा फटका बसत आहे. ३० ते ४० टनाच्या शेकडो मोठया ट्रक रस्त्यावरून जातात. तसेच हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनाला जातात. सदर पूल चार खांबावर आणि दोन मोठ्या भीम साह्याने उभा आहे. परंतु सण २०२० पासून पुलाच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला. तो खड्डा फक्त तात्पुरता सिमेंटने बुजवत मलमपट्टी करून ठेकेदार हितासाठी पातुरता दुरुस्त केला जातो. पण कायमस्वरूपी व्यवस्थित केला जात नाही. आता या खड्ड्याने मोठं रूप धारण केलं असून येणाऱ्या काही महिन्यात पूल पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुलावरून अवजड वाहन जाताच पूल पूर्णपणे हादरत आहे. यामुळे पुलाच्या खालच्या बाजूचा स्लॅबचे सिमेंट गळून पडत आहे. तर पुलाला आधार देणाऱ्या खांबाला भेगा पडल्या आहेत. तसेच पुलावर डांबरीकरण झाले नसल्यामुळे गज उघडे पडून तुटून उभे राहिले आहेत. यामुळे मोठा वाहन अपघात होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्याकडून टोलवाटोलवी उत्तरे सार्वजनिक बांधकाम विभागाची लऊळपर्यत हद्द असताना जबाबदारी झटकत रस्ते महामंडळाकडे बोट दाखवले जात आहे. टोलवा टोळवीला कंटाळून युवा सेना तालुका प्रमुख विक्रांत भलाणी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उपजिल्हाप्रमुख रोहन बलक्षे, युवासेना शहर प्रमुख अकाढ खरात, आकाश बोराटे, रोहन वाघमारे, प्रसाद पारखे यांनी वृक्षारोपण केले. रस्ते विकास मंडळाकडे दाखवले बोट सदरील रस्ता आमच्याकडे येत नाही. त्या खड्ड्याचे मला माहित नाही. राज्य रस्ते विकास मंडळाचे काम आहे. त्याना विचारा त्यांचे ऑफिस कुठे आहे, मला माहित नाही शोधा असे उत्तर सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंता सुनील हेळकर यांनी देऊन फोन बंद केला.
शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमाच्या गुणांकनात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांचा सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उत्कृष्ट कार्यालय प्रमुख म्हणून प्रशस्तिपत्र प्रदान गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेने सेवाकर्मी कार्यक्रमातील विविध निकषांवर १०० पैकी ८० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. कर्मचा-यांना पदोन्नती, निवृत्ती लाभ वेळेत मिळणे आता सुलभ झाले आहे. ज्येष्ठता सूची, पदोन्नती व सरळ सेवा नियुक्तीची स्थिती, बिंदुनामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती, आयजीओटी पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्णता आणि सेवा पुस्तक अद्ययावत करणे या सर्व बाबींमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे कार्य मूल्यांकन करण्यासाठी सेवाकर्मी कार्यक्रम राबवण्यात आला. ^शासनाच्या १५० दिवस सेवा कर्मी कार्यक्रमातील पारदर्शकता, शिस्तबद्धता आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर दिल्याने सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटला. कुलदीप जंगम, सीईओ, जि. प पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी अधिक कर्मचा-यांची सेवा पुस्तके अद्ययावत केल्याने निवृत्ती नंतरचे प्रस्ताव तातडीने तयार करणे शक्य होणार आहे. बिंदूनामावली प्रमाणित केल्याने रिक्त जागांवर कर्मचा-यांना वेळेत पदोन्नती समुपदेशन पध्दतीने करणे शक्य होणार आहे. ज्येष्ठता सूची बिंदूनामावली नुसार केल्याने सप्टेंबर ते ऑगस्ट दरम्यान रिक्त होणा-या जागांवर वेळेत पदोन्नती मिळू शकते.
वाशिंबे जेऊरवाडी (ता. करमाळा) येथील शंभू महादेवाच्या मानाच्या कावडीचे शिंगणापूरकडे प्रस्थान झाले असून, या सोहळ्यात गावातील एक हजारापेक्षा जास्त भाविकांचा सहभाग असून या कावडी सोबत चाळीसपेक्षा जास्त संख्येने असलेल्या बैलगाड्यामध्ये महिला, लहान मुलांसह एकूण १३०० ते १४०० लोकांचा सहभाग आहे. १०० कि.मी अंतरावरील शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या डोंगरावर कावड घेऊन निघाले आहेत. जेऊरवाडी येथील कावडे मंडळी पायी कावड सोहळ्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम असून, रामनवमीच्या दिवसी कावडीचे शिंगणापूरकडे प्रस्थान होते. जेऊरवाडी येथील कावडीचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील सर्वच तरुणांचा यामध्ये सहभाग असतो. चैत्र महिन्यातील रखरखत्या उन्हात उन्हात मंडळी कावड शिंगणापूरपर्यंत घेऊन जातात. परंपरेप्रमाणे कावडीसोबत असलेल्या इतर लोकांसाठी व साहित्य घेऊन जाण्यासाठी आजही बैलगाडीचा वापर केला जातो. यावर्षी कावडीसोबत चौतीस बैलगाड्या आहेत. जेऊरवाडी येथून निघाल्यापासून जाताना केंदर, वढवारी व नातेपुते या तीन ठिकाणी व येताना तीन ठिकाणी या कावडीचा मुक्काम असतो. हर महादेव या जयघोष करत कावड नावंत शिखर शिंगणापुरला जातात. शंभू महादेवाला धार घालून दोन दिवस शिंगणापुरात राहून पुन्हा चालत ही कावड गावाकडे घेऊन येते. महादेवाच्या कावडीची अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम ठेवली असून खास कावडी सोबत यात्रेला जाण्यासाठी अनेक जणांनी बैलगाड्या विकत घेतले असून यासाठी गावात दीड ते दोन कोटी रुपयांची उलाढाल या १५ दिवसात झाली आहे. कावड निघण्यापूर्वी १५ दिवसापासून या सोहळ्याची तयारी सुरू असते. गावामध्ये एक उत्साहाचे वातावरण या निमित्ताने असते. काळानुसार अनेक साधने बदलली, पूर्वी या कावडीसोबत जाण्यासाठी बैलगाडी हे एकमेव साधन असायचे त्यामुळे त्याचा वापर केला जात असे. सध्या वाहतुकीची अनेक आधुनिक साधने उपलब्ध असताना सुद्धा या कावडीसोबत वाहतुकीसाठी बैलगाड्यांचा वापर केला जातो. इतरवेळी घरी बैलगाडी नसलेले लोकसुद्धा खास या कावडीबरोबर जाण्यासाठी नवीन बैलगाडी विकत घेतात. यावर्षी चाळीस बैलगाड्या या कावडीसोबत आहेत.
दरवर्षी चैत्री यात्रेनिमित्त भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात दशमीच्या संध्याकाळ पर्यंत केवळ ६८ जनावरे दाखल झालेली आहे. सुमारे २७ एकराचे पालखी तळाचे बाजार मैदान अक्षरश ओस पडल्याचे दिसत आहे. बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदा एवढी अत्यल्प संख्या नोंदवली गेली आहे. जनावरांचा बाजार मार्केट कमिटीसाठी तोट्याचा ठरणार आहे. चैत्री यात्रेनिमित्त दरवर्षी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जनावरांच्या बाजाराचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी चैत्र यात्रेच्या बाजारात किमान १५०० ते २ हजार जनावरे येत असतात. जनावराची खरेदी विक्री आणि शेती उपयोगी साहित्यांच्या विक्रीतून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. प्रतिनिधी | पंढरपूर चैत्र शुद्ध कामदा एकादशी निमित्त पंढरीत दशमीच्या संध्याकाळ पर्यंत सुमारे दीड लाखांवर भाविक दाखल झालेले आहेत. राज्यात असलेली गॅस, पेट्रोल आणि डिझेलची टंचाई, शिखर शिंगणापूर येथे यात्रा आणि उन्हाचा कडाका यामुळे यंदा भाविकांची संख्या कमालीची घटल्याचे दिसत आहे. ६५ एकर मैदानात केवळ २५ दिंड्या आलेल्या आहेत आणि साधारण १५ हजार भाविक या मैदानात वास्तव्यास असल्याचे दिसत आहेत. भाविकांसाठी अपघात विमा संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षी होणारी चैत्री यात्रा आज (दि. २९ मार्च) रोजी पार पडत असून, यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांचा विचार करून श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने सर्वंकष नियोजन केले आहे. सुलभ, सुरक्षित व जलद दर्शना सोबतच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. यंदाच्या वर्षी चैत्रीच्या बाजाराकडे पशुपालकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येते. बाजार समिती आणि वाखरी ग्रामपंचायतीच्या वतीने नेहमी प्रमाणे बाजारासाठी मूलभूत सुविधा पुरवल्या आहेत. परंतु गॅस, पेट्रोल, डिझेल टंचाई मुळे शेजारच्या तालुक्यातून, जिल्ह्यातून येणाऱ्या जनावरे, व्यापारी आलेले नाहीत. बाजारनिमित्त एकही हॉटेल आलेले दिसत नाही, तसेच शेती उपयोगी साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी ही पाठ फिरवली आहे. ६५ एकर मैदानातील भक्तीसागर येथे यंदा दशमीपर्यंत केवळ २५ दिंड्या दाखल झालेल्या आहेत. सुमारे १५ हजार भाविक आहेत. मागील वर्षी चैत्री यात्रेला ५५ दिंड्या, ६० हजारावर भाविक उपस्थित होते. यात्रा कालावधीत मंदिरातील पारंपरिक धार्मिक कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात येत आहेत. एकादशीच्या पहाटे श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेची नित्यपूजा अनुक्रमे सदस्य ह.भ.प. प्रकाश जवंजाळ व सदस्य संभाजी शिंदे यांच्या शुभहस्ते सपत्नीक संपन्न होणार आहे. द्वादशीला ह.भ.प. आजरेकर महाराज यांचा नैवेद्य तर त्रयोदशीला ह.भ.प. गुरु बाबासाहेब आजरेकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे. चैत्र नवमी पासूनच जनावरे दाखल होत असतात, परंतु दशमीच्या दिवशी ( शनिवारी ) सकाळी केवळ ११ जनावरे होती, तर संध्याकाळी ८ वाजेपर्यंत गाय, बैल, खोंड, म्हैस अशी एकूण ६९ जनावरे बाजार तळावर दिसत होती. यावरून संपूर्ण बाजार तळ ओस पडलेला दिसून येतोय. बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या अत्यल्प संख्येने जनावरे आलेली आहेत. आणि बाजार समितीला यंदाचा बाजार आतबट्ट्याचा व्यवहार ठरणार आहे. { आरोग्य सेवांसाठी पत्राशेड परिसरात तालुका आरोग्य विभागाचा वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला असून उपजिल्हा रुग्णालयामार्फत दर्शन मंडप सुविधा उपलब्ध . { दशमी, एकादशी व द्वादशी दिवशी दर्शनरांगेतील भाविकांना लिंबू सरबत तसेच तांदूळ किंवा साबुदाणा खिचडी, उपीटचे वाटप करण्यात येत आहे. उन्हापासून सुरक्षेसाठी पत्रा शेडची सोय केली. { दर्शन प्रक्रिया गतिमान ठेवण्यासाठी अनुभवी कमांडोंची नियुक्ती करण्यात आली. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आपत्कालीन व्यवस्थेची विशेष तयारी करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेची रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह तैनात राहणार आहे. सिझफायर यंत्रणा, १५७ सीसीटीव्ही कॅमेरे, नियंत्रण कक्ष, वायरलेस प्रणाली, जनरेटर, मेटल डिटेक्टर, मोबाईल लॉकर, बॅग स्कॅनर मशीन, सार्वजनिक सूचना प्रणाली व चौकशी कक्ष कार्यरत ठेवण्यात आले आहेत. तसेच भाविकांसाठी अपघात विमा संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली. जनावरे आले नाहीत स्वयंपाकासाठी लाकडाचा वापर दिंड्यासाठी दरवर्षी गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले जातात. परंतु यंदा यात्रेसाठी सिलिंडर उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे बहुतांश दिंड्यांनी केवळ चपात्या करण्यासाठी उपलब्ध सिलिंडरचा मर्यादित वापर केला. भक्तीसागर मैदानामध्ये केवळ २५ दिंड्या दाखल जवंजाळ व संभाजी शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा दर्शन रांगेत आरोग्य, फराळाची सुविधा बाजार तळ ओसाड
भोंदू अशोक खरातची आज पोलिस कोठडी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्याला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने शनिवारी खरातची सलग 10 तास कसून चौकशी केली. त्यानंतर त्याच्या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागातील कार्यालयाचीही झाडाझडती घेण्यात आली. या कार्यालयातील अत्युच्च दर्जाच्या काळ्या काचा पाहून पोलिसही थक्क झाले. अशोक खरातने आपल्या कार्यालयाची रचना करताना खास काळजी घेतली होती. आपल्या केबिनच्या बाहेर लोकांची गर्दी असतानाही आतमध्ये तो महिलांचे बिनधास्तपणे लैंगिक शोषण करायचा. केबिनच्या दरवाज्याबाहेर महिलांचे पती किंवा इतर लोक बसलेले असायचे. पण या काचांमुळे त्यांना आत केबिनमध्ये काय सुरू आहे याचा कोणताही थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे खरातच्या काळ्या कारवायांत कोणताही अडथळा येत नव्हता. त्यामुळे एसआयटी या प्रकरणी खरातच्या कार्यालयाचा कानाकोपरे धुंडाळून त्याच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. देशभक्तीचा देखावा, स्वच्छ प्रतिमेचा आव देशभक्तीच्या गप्पा, भिंतीवरील तिरंगा आणि हरिवंशराय बच्चन यांची ‘कोशिश करने वालों की हार नहीं होती’ ही प्रेरणादायी कविता... हे चित्र एखाद्या स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीच्या कार्यालयाचे असावे असेच कुणालाही वाटेल. पण कॅनडा कॉर्नरमधील हे 210 चौरस फुटांचे कार्यालय म्हणजे भोंदू अशोक खरातचा महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा अड्डा बनले होते. रॅगिंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी बेड्या ठोकलेल्या कॅप्टन खरातने याच झेड ब्लॅक काचांच्या आड महिलांचे शोषण करत आपल्या विकृत वासनेचा बाजार मांडला होता. त्याच्या या कार्यालयाची शनिवारी 28 मार्च रोजी फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांनी कसून तपासणी केली. एसआयटीतर्फे आज सरकारी वकिलांकडून याविषयी कोर्टात महत्त्वाची माहिती सादर केली जाण्याची शक्यता आहे. अशोक खरातविरोधात आणखी काही महिलांनी पुढे येऊन तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे एसआयटी कोर्टाकडे त्याची वाढीव कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे. एसआयटीने यापूर्वीच्या सुनावणीत खरातवर 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला होता. या मुद्यावरही आज कोर्टात एसआयटी स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे. खरातचा बंगला नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या कर्मयोगीनगर येथे अशोक खरातचा आलिशान बंगला आहे. या बंगल्यासमोरून जाताना आजही अंगावर काटा येतो. ज्या परिसरात तीन - तीन माजी आमदार वास्तव्यास आहेत, त्याच गल्लीत 2012 च्या सुमारास भोंदू खरातने 5 कोटींहून अधिकचा खर्च करून आपला महाल उभा केला. तृप्तबाला नाव असलेला हा बंगला केवळ त्याच्या भव्यतेसाठी नाही, तर तिथे चालणाऱ्या काळपट कृत्यांमुळे कायमच संशयाच्या भोवऱ्यात राहिला. आता लैंगिक अत्याचाराचे गंभीर पाश समोर आल्यानंतर, या बंगल्याच्या भिंतींमागे दडलेली अनेक काळी रहस्ये उघड होऊ लागली आहेत. अमावस्येच्या रात्री बंगल्यावर नेते, अधिकाऱ्यांचा रांगा एरव्ही खरातच्या कुटुंबातील सदस्यांचा वावर असलेल्या या बंगल्याचे रूप अमावास्येच्या रात्री पूर्णपणे पालटायचे. 'अमावास्येच्या रात्री या बंगल्याबाहेर महागड्या चारचाकी वाहनांच्या रांगा लागायच्या, असे एका स्थानिक नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. राजकीय नेते, बडे अधिकारी आणि आपली ओळख लपवू पाहणारे व्हीआयपी लोक खरातच्या अधिकृत कार्यालयात न जाता, चोरट्या पावलांनी थेट या बंगल्याची पायरी चढायचे. रात्रीच्या काळोखात रंगणाऱ्या या दरबारात नक्की काय चालायचे याची चर्चा आता संपूर्ण नाशिकमध्ये वाऱ्यासारखी पसरली आहे. कॅप्टन खरातच्या लैंगिक अत्याचाराचे पाप चव्हाट्यावर आल्यानंतर कर्मयोगीनगरमधील चित्र बदलले आहे. ज्या बंगल्याकडे लोक कधीकाळी कुतूहलाने पाहायचे, तिथे आता भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
मनपाच्या सन २०२६-२०२७ च्या अंदाजपत्रकीय महासभेत अंदाजपत्रकातील तरतुदींच्या आकडेवारीऐवजी संबंधित विभागाच्या कारभारावरूनच चर्चा झडली. शेवटच्या टप्प्यात माळीवाडा वेस पाडण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गदारोळ केला. शिवसेनेने विरोध केला. याच गदारोळात अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. शुक्रवारी झालेल्या सभेत घरपट्टी सर्वेक्षण व वाढीव पाणीपट्टीच्या सवलतीसाठी चर्चा झाली. मात्र, अंदाजपत्रक मंजूर करत असताना यावर चर्चा अथवा निर्णय झाला नाही. शनिवारी दुपारी तहकूब सभा सुरू झाल्यावर विविध विषयांवर चर्चा झडली. ब्लड बँकेवर दरमहा सहा लाख रुपये खर्चून एकही पिशवी संकलित होत नाही. ही ब्लड बँक खासगी संस्थेला चालवायला द्या, अशी मागणी नगरसेवक विकास जगताप यांनी लावून धरली. नगरसेवक गणेश भोसले यांनी माळीवाडा वेशीचे महत्त्व काय असा सवाल केला. नगरसेवक संपत बारस्कर यांनी प्रशासनाने वेस न पाडल्यास आम्ही ती पाडू, असा इशारा दिला. शिवसेनेचे गटनेते दत्तात्रय कावरे आणि माजी महापौर सुरेखा कदम यांनी याला विरोध केला. दरम्यान, ब्ल्यू लाईनमध्ये अंतिम मंजुरी असलेल्या ले-आऊटमध्ये बांधकाम परवानगी का दिली जात नाही, यावरून मयूर बांगरे आणि विकास जगताप यांनी प्रशासनाला धारेवर धरले. नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक स्नेहल यादवव यांनी आधीच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या परवानग्या दिल्याचे मान्य केले. एआय इमेज महासभेत काहींनी ब्लड बँक खासगी संस्थेला चालवण्यास देण्याची मागणी केली. प्रत्यक्षात ब्लड बँक खासगी संस्थेला चालवण्यास देण्यासाठी मागील वर्षी सप्टेंबरमध्येच प्रशासकांनी निर्देश दिले आहेत. कंत्राटी कर्मचारी भरतीसाठी प्रस्तावित निविदा रद्द करून हे निर्देश दिले होते. दोन संस्थांकडून प्रस्तावही आलेले आहेत. ही माहिती मात्र प्रशासनाने सभागृहात देणे टाळले. काही नगरसेवकांना याची माहिती होती, मात्र त्यांनीही मौन बाळगले. सभागृहात यावर निर्णय दिला गेला नसला तरी या चर्चेच्या माध्यमातून खासगीकरणाला वाट मोकळी करून देण्यात आल्याचे चित्र आहे. गॅस पाइपलाइनसाठी रस्ते खोदाईच्या आदेशाला विरोध शहरात नव्याने झालेल्या रस्त्यांवर गॅस पाईपलाईनसाठी खोदाई करण्यास नगरसेवकांनी विरोध दर्शवला. नगरसेवक निखिल वारे यांनी शासनाला आमचा विरोध कळवा, असे सांगितले. नगरसेवक गणेश भोसले, बाबासाहेब वाकळे यांनीही याला विरोध केला. शासनाच्या आदेशानुसार खोदाई करण्यास विनाशुल्क परवानगी दिल्यास शहर उद्ध्वस्त होईल, अशी भीती वारे यांनी व्यक्त केली. येत्या वर्षात प्रस्तावित नवे प्रकल्प, योजना, उपक्रम • महापौर ज्योती गाडे यांनी विविध घोषणा केल्या. प्रत्येक प्रभागात नमो उद्यान' विकसित करण्यात येणार असून यात जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम आणि लहान मुलांसाठी खेळणी • महानगरपालिकेची स्वमालकीची पवन चक्की उभारण्यात येणार • चितळे रोड येथील नेहरू मार्केटच्या जागी आणि गंज बाजार, भाजी मार्केट येथे नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स • महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण आणि योगासन वर्ग, पाळणाघर • ई-वाहनांच्या चार्जिंग पॉईंटसाठी मनपाची जागा भाडेतत्वावर दिली जाणार
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईबाबत उडालेला गोंधळ पाहता वाहन बाजाराचे समीकरण बदलत आहे. पेट्रोल पंपावर रांगा लागल्यानंतर, इलेक्ट्रिक बाईक खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे चित्र आहे. आठवडाभरात या गाड्यांच्या मागणीत सुमारे ६० टक्क्यांपर्यंत मागणी वाढल्याचे चित्र आहे. शहरातील इलेक्ट्रिक बाईक विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन इलेक्ट्रिक बाईकला सुमारे आठ ते पंधरा दिवसांचे वेटिंग आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. अशा स्थितीत, इलेक्ट्रिक वाहन बाजारात मागणी वाढल्याचे दिसून आले. पाडव्यानंतर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीला प्रतिसाद मिळाल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. दिव्य मराठी'शी बोलताना अप्पासाहेब होले म्हणाले, पाडव्यापर्यंत दरमहा सुमारे २५० पेट्रोलच्या तर १०० इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री झाली. मागील चार दिवसांत अचानक इलेक्ट्रिकला अधिक मागणी वाढल्याचे दिसून आले. शहराभरात सुमारे १०० ते १५० गाड्या वेटिंगवर आहेत. पूर्वीपेक्षा दुप्पट मागणी वाढली असून, आखाती युद्ध संपले नाही तर इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत अधिक वाढ होऊ शकते. आमच्या एका दालनात दोन दिवसांपूर्वी २४ तासांत ४० इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री झाली. नव्याने बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना दहा ते पंधरा दिवस वाट पहावी लागणार आहे. याव्यतिरिक्त इतर दालनांमध्येही वेटिंग असल्याचे दिसून आले. याव्यतिरिक्त तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनांनाही चांगला प्रतिसाद असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. अभिमन्यू नय्यर सद्यस्थितीत इलेक्ट्रिक बाईकला ६० टक्क्यांनी मागणी वाढली आहे. परंतु, प्लँटमध्ये गॅसची अडचण आहे. वेल्डिंगशिवाय गाड्या कशा तयार होणार ? सध्याची स्थिती अशी आहे की, इलेक्ट्रिक बाईकचा स्टॉक संपत आला आहे. त्यामुळे बुकिंगनंतरही आठ ते दहा दिवस वेटिंगवर रहावे लागेल. तीन चाकी ऑटोलाही आता मागणी वाढली आहे.
चांगले आरोग्य असेल तरच खेळाडू आपल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. शरीर हीच खरी संपत्ती आहे, त्यामुळे प्रत्येकाने फिटनेसकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल आठरे यांनी व्यक्त केले. युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालयाच्या मेरा युवा भारत अहिल्यानगरच्यावतीने न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल या सांघिक खेळांसोबतच गोळाफेक आणि धावणे या वैयक्तिक स्पर्धांनीही रंगत आणली. अत्यंत चुरशीच्या लढतींमुळे संपूर्ण परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. महाविद्यालयाच्या जिमखाना मैदानावर खेळाडूंची लगबग पाहायला मिळाली. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल आठरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मेरा युवा भारतचे सत्यजीत संतोष, जिमखाना चेअरमन अनंत पंडित, शरद मगर, धन्यकुमार हराळ, रमेश गाडगे, श्रीकृष्ण मुरकुटे उपस्थित होते. प्रास्ताविकात शरद मगर यांनी सांघिक खेळांसोबत वैयक्तिक स्पर्धांचेही आयोजन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. शासकीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यास खेळाडूंच्या करिअरला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले. न्यू आर्ट्स महाविद्यालयातून अनेक दिग्गज खेळाडू घडले असून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. विशेषत: कबड्डी संघाने राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केल्याचेही त्यांनी सांगितले. उपप्राचार्य अनिल आठरे यांनी आपल्या भाषणात खेळाडूंच्या फिटनेसचे महत्त्व अधोरेखित केले. चांगले आरोग्य असेल तरच खेळाडू आपल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. शरीर हीच खरी संपत्ती आहे, त्यामुळे प्रत्येकाने फिटनेसकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
जावयाने सासऱ्याच्या घरासमोर लिंबू, हळदीकुंकू, काळी बाहुली टाकून उंबऱ्याची पूजा करुन काळी जादू करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार देवळाली प्रवर येथे २७ रोजी रात्री १२.४५ च्या सुमारास देवळाली प्रवरा येथील गोविंद पठारे यांच्या वस्तीवर घडला. दरम्यान, या प्रकाराने भयभीत झालेल्या पठारे कुटुंबीयांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांच्या मनातील भीती दूर केली. २७ रोजी रात्री १२.४५ च्या सुमारास देवळाली प्रवरा येथील गोविंद पठारे यांचे वस्तीवर ३ ते ४ इसम आले. त्यांनी मुख्य दरवाजा उघडून आत प्रवेश केला व घरासमोर लिंबू, हळदीकुंकू, काळी बाहुली टाकून उंबऱ्याची पूजा केली. अंगणातही पूजा सुरू केली. याची खबर खोलीत झोपलेल्या पठारे कुटुंबाला लागताच ते जागे झाले. त्यांनी दरवाजा उघडून पाहिला असता समोर तीन ते चार इसम हळदी कुंकू गुलाल टाचणी टोचलेले लिंबं, सोबत नायलॉन दोरी, कुऱ्हाड, एक गलोर असे साहित्याची पूजा करत असल्याचे लक्षात आले. पठारे कुटुंबीयांनी आरडाओरड करताच ते चारही इसम पळू लागले. त्यातील एका इसमास पठारे कुटुंबीयांनी पकडले. पठारे कुटुंबियाने जो इसम पकडला तो त्यांचाच जावई निघाला हे विशेष. त्यांनी त्यास पकडून ठेवले व पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या सोबत कुऱ्हाड,गलोल, नायलॉन दोरीही होती. आमच्या जिवीतास धोका असल्याचे पठारे कुटुंबियानी अंनिसच्या कार्यकर्त्यांना सांगितले. या घटनेमागे जो कुणी बुवा बाबा असेल ज्याने अशा प्रकारची पूजा करुन आम्हाला घालवण्याचा प्रयत्न केला. त्याचाही शोध घेऊन कारवाई करावी, अशीही मागणी पठारे कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेमुळे पठारे कुटुंबीय घाबरले होते. ही घटना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲड रंजना गवांदे, अशोक गवांदे माजी जिल्हा संघटक देविदास देसाई यांनी भयग्रस्त कुटुंबाची भेट घेतली व त्यांच्या मनातील भीती दूर केली, अशा जादूटोण्याने किंवा लिंबू, नारळाने काही होत नसते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भेटीने पठारे कुटुंबियांना मानसिक आधार मिळाला.
देव ,देश आणि धर्माच्या उत्थानासाठी संघाचे कार्य खूप प्रेरणादायी आहे. संघ स्वयंसेवक कायम देव, देश, धर्म यांचा विचार करून आपले कार्य करतात. संघ स्वयंसेवक घरोघरी जाऊन हिंदू समाजाला जागृत करण्याचे काम करीत आहे. सर्व समाजाने जातीभेद विसरून धर्मकार्यासाठी एकत्र आले पाहिजे.आपल्या कुटुंबावर मुलावर योग्य संस्कार केले पाहिजे. धर्मकार्यासाठी प्रेक्षक न होता धर्माचे रक्षक व्हा, असे आवाहनश्रीक्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी केले. समाजातील भेदभाव दूर होऊन हिंदू समाज संघटित व्हावा आणि देव, देश, धर्मासाठी कार्यरत व्हावा. या मुख्य उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी निमित्त चांदा येथील श्री दत्त साधकाश्रम या ठिकाणी हिंदू संमेलनास प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून देवगड संस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशानंद गिरीजी महाराज बोलत होते. प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाशिक विभाग बौद्धिक प्रमुख कृष्णाजी घरोटे हे होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संभाजी दहातोंडे, संघाचे नेवासे तालुका कार्यवाह सुनील सावंत उपस्थित होते. चांदा येथील जिल्हा परिषद शाळा इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील संतांच्या वेशभूषेत नाटिका सादर केली त्यामध्ये त्यांनी संतांनी दिलेले सामाजिक संदेश नाटकाच्या माध्यमातून सादर केले. प्रकाशांनंदगिरीजी महाराज व इतरांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. या संमेलनास चांदा, रस्तापूर,कौठा, घोडेगाव व परिसरातून हजारो हिंदू बांधव माता-भगिनी पुरुष बांधव उपस्थित होते. कृष्णाजी घरोटे म्हणाले, संघाच्या शाखेमध्ये आदर्श व्यक्ती निर्माण होतात,आदर्श समाज जीवनासाठी व्यक्ती निर्माण करण्याचं काम संघ आपल्या शाखेतून करत असतो. भारताला जर परम वैभवशाली, विश्वगुरू बनवायचं असेल तर समाजामध्ये आपण एक जबाबदार नागरिक म्हणून वागले पाहिजे . समाज परिवर्तित झाला की राष्ट्र आपोआप प्रबळ आणि शक्तिशाली बनेल. प्रास्ताविक योगेश्वरी दरंदले यांनी केले. त्या म्हणाल्या, या हिंदू संमेलनाच्या पूर्वतयारीच्या प्रक्रियेत चांदा गाव व परिसरातील गावांत अभुतपूर्व जनजागृती राबवण्यात आली. त्यात ७ गावांतील २ हजार २३८ हिंदू घरामध्ये गृहसंवाद अभियान राबवण्यात आले. या अभियानात ४० कार्यकर्ते सहभागी झाले होते. या हिंदू सम्मेलनाची सांगता पसायदानाने झाली. सूत्रसंचालन समितीचे सदस्य अमोल अंबाडे यांनी केले.
राहाता शहराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख असलेली राजा वीरभद्र महाराज यात्रा यंदा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. शतकानुशतके जपलेली ही परंपरा केवळ धार्मिक विधी नसून ती लोकसंस्कृतीचा जिवंत ठेवा आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हसोबा मंदिरात नारळ फोडून या उत्सवाला सुरुवात होणार असून, हनुमान जयंतीपर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष जाबाजी मेचे यांनी दिली. या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 'गळवंती' (बगाड). नवसपूर्तीसाठी दरवर्षी हजारो महिला व पुरुष भाविक या गळवंतीला लागतात. कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर आता पुन्हा एकदा हा भक्तिमय थरार अनुभवण्यासाठी राज्यभरातून भक्त राहात्यात दाखल होणार आहेत. २ एप्रिल रोजी नवनाथ महाराज यात्रा, तर ३ एप्रिल रोजी राजा वीरभद्र महाराजांची मुख्य यात्रा भरणार आहे. पारंपरिक तंत्राने साकारलेला २४ फुटी रथ यात्रेचे आकर्षण असलेला गळवंती रथ हा अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. विशेष म्हणजे, यात लोखंडाचा अजिबात वापर न करता केवळ सागवान, रामकाठी लाकूड आणि दोरांच्या साहाय्याने २४ फूट उंचीचा भव्य रथ उभारला जातो. हा रथ ओढण्याचा आणि बनवण्याचा मान पिढ्यानपिढ्या ठराविक समाजघटकांकडे असून, हे सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानले जाते. पुजाऱ्यांचे 'भाकीत' ऐकण्यासाठी उत्सुकता यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे वीरभद्र आणि नवनाथ महाराजांच्या मंदिरासमोर पुजारी सर्जेराव भगत हे आगामी वर्षाचे 'भाकीत' (होईक) वर्तवतात. पाऊस-पाणी, शेती आणि सामाजिक परिस्थितीबाबतचे हे भाकीत ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठी गर्दी करतात. त्यापूर्वी आठ दिवस शहरात मिष्टान्न भोजनाची परंपराही मोठ्या उत्साहात पार पडते. कुस्ती स्पर्धा, बैलगाडा शर्यती, लोककलावंतांचे कार्यक्रम आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवात विद्युत रोषणाई, शोभेची दारूकाम, कुस्ती स्पर्धा, बैलगाडा शर्यती आणि लोककलावंतांचे कार्यक्रम होणार आहेत. कीर्तनाने या महोत्सवाची सांगता होईल, अशी माहिती माजी अध्यक्ष साहेबराव निधाने यांनी दिली. गळवंती म्हणजे केवळ रथ नाही, तर ती गावाची ओळख आणि शतकानुशतके जपलेला अभिमान आहे. आजच्या तरुण पिढीने हा सांस्कृतिक वारसा जपण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे वीरभद्र देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष विजय सदाफळ यांनी सांगितले.
एखाद्या मर्डर मिस्ट्री सिनेमाच्या कथेला शोभेल अशी भयंकर घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. येथील एका पोलिस महिलेने स्वतःच्या पोलिस असणाऱ्या वडिलांना मिल्कशेकमध्ये विष देऊन संपवले. या घटनेचा कुणालाही थांगपत्ता लागला नाही. पण 3 वर्षांनंतर या महिलेचे प्रियकरासोबत बिनसले आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला. त्यानंतर अवघा महाराष्ट्र हादरला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पोलिस अधिकारी जयंत बल्लावार (45) हे 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ड्युटीवर जाण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांची मुलगी आर्या जी सध्या पोलिस कर्मचारी आहे, तिने त्यांना मिल्कशेक करून दिले. वडिलांनी ते मिल्कशेक घेतले आणि कामावर गेले. त्यानंतर ते चंद्रपूरच्या जिल्हा न्यायालयाच्या प्रशासकीय इमारतीत पोहोचले, तेव्हा त्यांना चक्कर आली व ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तेव्हा या घटनेत कोणतेही गुन्हेगारी कृत्य दिसून आले नाही. त्यामुळे जयंत बल्लावार यांच्या आकस्मिक मृत्यूची फाईल बंद करण्यात आली. पण 3 वर्षांनंर अचानक पोलिसांनी जयंत बल्लावार यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांची स्वतःची मुलगी व इतर 3 जणांना अटक केली. त्यानंतर झालेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. बल्लावार यांचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता तर एक पूर्वनियोजित खून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आणि सर्वांच्या अंगाचा थरकाप उडाला. नेमकी काय घडली घटना? त्याचे झाले असे की, आर्या बल्लावार हिचे आशिष शेडमाके नामक तरुणाशी 2022 पासून प्रेमसंबंध होते. आर्याचे वडील जयंत बल्लावार यांचा या संबंधांना विरोध होता. त्यामुळे ते आर्या व आशिषच्या प्रेमात अडथळा ठरत होते. त्यामुळे आर्याने स्वतःच्या वडिलांना ठार मारण्याचा कट रचला. तिने आपला दूरचा भाऊ चैतन्य गेडाम (22) याला बोलावून घेतले. त्याला 5 हजार रुपये दिले आणि विष आणण्यास सांगितले. या प्रकरणातील चौथा व्यक्ती अद्याप समोर आला नाही. हा व्यक्ती हे विष विकणारा विक्रेता आहे. त्यानंतर 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी आर्याने आपल्या पोलिस अधिकारी असलेल्या वडिलांसाठी मिल्कशेक बनवले. त्यात हे विष टाकले. हे मिल्कशेक पिऊन जयंत बल्लावार आपल्या कर्तव्यावर निघून गेले. त्यांची ड्युटी जिल्हा कोर्टात होती. तिथे पोहोचल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली. ते खाली कोसळले आणि त्यांचा तत्काळ मृ्त्यू झाला. बल्लावर हे सर्वांपुढे चक्कर येऊन पडल्यामुळे ते चालता-बोलता गेले असा सर्वांचा समज झाला. त्यामुळे कुणीही त्यांच्या शवविच्छेदनाची मागणी केली नाही. असे उघडकीस आले हत्याकांड? जयंत बल्लावार यांच्या निधनानंतर आर्याची अनुकंपा तत्वावर वडिलांच्या जागी पोलिस म्हणून निवड झाली. त्यानंतर तिने आशिषशी लग्न केले. मधल्या काळात आशिषही पोलिसांत भरती झाला. पण बेशिस्त व घाणेरड्या वर्तणुकीमुळे त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करम्यात आली. या काळात आर्याचे आशिष सोबत वाद वाढले. त्यांच्यात नेहमी भांडणे होऊ लागली. त्यानंतर गत आठवड्यात आशिष संतापाच्या भरात पोलिस ठाण्यात गेला आणि तिथे त्याने आपल्या बायकोने अर्थात आर्याने स्वतःच्याच वडिलांना विष देऊन ठार मारल्याचे सांगितले. हे ऐकूण पोलिसांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ आशिषसह आर्या, तिचा भाऊ चैतन्य गेडाम व इतर एकाला अटक केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. पण या हत्याकांडामुळे अवघे पोलिस दल चक्रावून गेले आहे.
राज्यात उद्यापासून म्हणजे 30 मार्चपासून ढगाळी वातावरण आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवे सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्यापासून प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातही काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. कधी-कुठे पावसाची शक्यता? 30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. पण या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान व वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर 1 ते 4 एप्रिलपर्यंत वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणी ढगाळी वातावरण, दुपारनंतरचा वादळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रब्बी पिकांची काळजी घ्या त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवस हवामानाच्या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत, सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, तसेच वादळी वारे, पाऊस व संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे. मेघगर्जना व विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीजेचे खांब व विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन या प्रकरणी करण्यात येत आहे. मुंबईतील हवामान कसं असेल? उल्लेखनीय बाब म्हणजे बुधवार - गुरूवारी राज्यातील काही भागांत तापमानाचा पारा 39 अंशावर पोहोचला होता. परभणी जिल्हा राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला असून बुधवारी येथे 39.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यानंतर सोलापूरमध्ये 39 अंश सेल्सिअस, तर जळगावमध्ये 38.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. मराठवाड्यातील काही भागांत पारा 37 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. या आठवड्यात होणाऱ्या पावसामुळे हा पारा उतरण्याची शक्यता असली तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकूण ४५ हजार १८७ शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, अवजारे व विविध आधुनिक कृषी यंत्रसामग्री खरेदी केली असून त्यासाठी शासनाकडून अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्षात अनुदान वितरणाची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने हजारो शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी आतापर्यंत १५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यानंतर कृषी आयुक्तालयाकडून आणखी ७ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून एकूण उपलब्ध निधी २२ कोटी ७५ लाखांवर पोहोचला आहे. तरीही एकूण आवश्यक निधीच्या तुलनेत सुमारे २७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी अजूनही प्रलंबित आहे. प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कृषी यांत्रिकीकरण योजना ही शेतीचे आधुनिकीकरण, उत्पादन वाढ आणि मजुरीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. मात्र, अशा योजनांमध्ये अनुदान वितरणात होणारा विलंब शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत करणारा ठरत असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्यासाठी आणखी २७ कोटी रुपयांचा निधी मिळणे बाकी असल्याने कृषी आयुक्तालयाकडून अनुदानाचा निधी कधी मिळणार, याबाबत अनुदानाच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे. Q. निवड पद्धत कशी राबवली होती? A. या वर्षी लॉटरी सिस्टिमने शेतकऱ्यांची निवड करण्यात आली नव्हती. प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य या क्रमाने निवड केली होती. Q.अनुदान कशामुळे रखडले? -अपेक्षित बजेट मिळाले नाही. आमच्याकडून शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. Q.शेतकऱ्यांना आर्थिक वर्ष संपल्यावर निधी मिळेल का? A. दोन दिवसांत जर शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही तर पुढच्या आर्थिक वर्षात अनुदान दिले जाईल. अनुदानाची प्रतीक्षा
नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींना एकाच छताखाली मिळण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा लाभ नागरिकांनी घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवून घ्यावेत असे आवाहन तहसीलदार सारिका भगत यांनी चिकलठाण येथे केले. चिकलठाण येथे राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार भगत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना भगत म्हणाल्या की, महसूल विभागाच्या सुविधा जलद गतीने उपलब्ध करून देणे व प्रशासनातील होणाऱ्या बदलांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे शिबिर आहे. या वेळी प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी लता बागूल, माजी पंचायत उपसभापती एकनाथ चव्हाण, चंदू शहा, पंचायत समिती सदस्य मुक्तार शहा यांनी मनोगत व्यक्त केले. या शिबिरात नायब तहसीलदार नीलेश राठोड, शिवसेना विभागप्रमुख कल्याण चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. झाकीर शेख, शिवाजी धनगर, मंडळ अधिकारी पी. एस. सुरवसे तलाठी किशोर निकम, दीपक एरंडे, नितीन एरंडे, नितीन मगरे, गणेश मोहिते, राहुल सुलाने ग्रामविकास अधिकारी म्हस्के, एस. एम. पाटील, जी. एस. मोहिते, कृषी सहायक देवरे, पोलिस पाटील गणेश वेताळ, विनोद चव्हाण, योगेश गवळी, माजी सरपंच युवराज चव्हाण यांच्यासह मंडळअंतर्गत असलेल्या गावांचे महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, पोलिस पाटील, विविध गावांतील सरपंच, लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मंडळ अधिकारी पी. एस. सुरवसे यांनी केले. कवी प्रवीण दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले. वैभव तोंडे यांनी आभार मानले. या वेळी विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ५४ फेरफार निकाली, ५७ नागरिकांना सातबारा आरोग्य, पुरवठा, महिला बाल विकास विभाग, महिला बचत गट, भूमी अभिलेख, महा-ई-सेवा महसूल विभाग यांच्या वतीने लाभार्थींच्या सेवेसाठी व मदतीसाठी विविध स्टॉल लावण्यात आले होते. या वेळी ५४ फेरफार निकाली काढण्यात आले. सातबारा दुरुस्तीसंदर्भात बारा अर्ज प्राप्त झाले. ५७ नागरिकांना डिजिटल सातबारा, ३८ जणांना आठ उतारे, ४५ नागरिकांना या अभियानांतर्गत विविध प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले. एक खिडकीअंतर्गत ४४ अर्ज निकाली काढण्यात आले.
लासूर येथे चिमुकल्यांनी केले लक्षवेधी नृत्य, गायन:सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन
लासूर स्टेशन येथील सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूलमध्ये शनिवार, २८ मार्च रोजी पूर्व-प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे आणि पालकांच्या आत्मीय स्वागताने झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाचा औपचारिक समारंभ पार पडला. पूर्व-प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी नृत्य, कविता, कथाकथन, विविध कलाकृती इंग्लिश भाषेच्या माध्यमातून आपल्या सुप्त गुणांचे प्रदर्शन केले. दरम्यान, पालकांसाठी एका प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे सूत्रसंचालन कृष्णा गवळी यांनी प्रभावी केले. या स्पर्धेत शिल्पा कदम आणि रामेश्वर शेलार हे विजेते ठरले. विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना डॉ. सबिहा सय्यद आणि डॉ. इजाज सय्यद यांच्या हस्ते गुणगौरव प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आले. शाळेचे व्यवस्थापक रेव्ह. फादर संजय पारखे, मुख्याध्यापक रेव्ह. फादर रॉकी लोपेस, विजय बोरखडे आदींनी मार्गदर्शन केले व प्रमुख पाहुण्यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. पालकांनी सेंट जॉर्ज शाळेने सादर केलेल्या प्रयत्नांची मनापासून प्रशंसा केली. रेव्ह. फादर संजय पारखे आणि रेव्ह. फादर रॉकी लोपेस यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेऊन सर्वांचे आभार मानले. सिस्टर फ्लोरी, क्षितिजा त्रिभुवन, सोनाली सरोवर, शिक्षक वृंद उपस्थित होते.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशातील ६ राष्ट्रीय पक्षांना एकूण ६,६४८.५६ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. पैकी सर्व पक्षांना मागे टाकत भाजपच्या तिजोरीत तब्बल ६,०७४ कोटी रुपये जमा झाले. त्यापाठोपाठ काँग्रेसला ५१७ कोटी तर ‘आप’ला ३८ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. उर्वरित ५ पक्षांच्या एकूण देणग्यांच्या दहापटीहून अधिक रक्कम एकट्या भाजपला मिळाली. दिल्लीनंतर महाराष्ट्रातून सर्वाधिक देणग्या दिल्याचे असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्म अर्थात एडीआरच्या (२६ मार्च) अहवालातून हे स्पष्ट झाले. महाराष्ट्रातून सर्व राजकीय पक्षांना दिलेल्या देणग्यांपैकी ९५% भाजपच्याच पारड्यात आहेत.दिल्लीनंतर महाराष्ट्र देशात दुसरा डोनर स्टेट आहे. तर गुजरात-३०९, पश्चिम बंगाल-२५४ आणि कर्नाटकमधून २२० कोटी रुपयांच्या देणग्या देण्यात आल्या आहेत. दिल्लीच्या प्रुडेंट इलेक्टोरल आणि मुंबईतील प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्टसारख्या संस्था मध्यस्थाचे काम करतात. प्रुडंटच्या देणगीदारांत कॉर्पोरेट समूह तर प्रोग्रेसिव्हमध्ये ‘टाटा’च्या कंपन्या आहेत. ‘दिव्य मराठी’ने दोन्ही ट्रस्टच्या अहवालातून टॉप १० डोनर्सची यादी मिळवली. या देणग्यांमध्ये २० हजार रुपयांखालील रकमेचा समावेश नाही.
कौटुंबिक,आर्थिकआणि शैक्षणिक अडचणी दूर करण्याकरिताआलेल्या काही महिलांना भोंदू खरातने नवीन घर देण्याचे आमिष दाखवले.आशीर्वादाच्या नावे ऊर्जा हस्तांतरणआध्यात्मिक उपचाराच्या नावाखाली महिलांना संमोहित केले. मी देवाचा अवतार आहे. तुम्ही खासआहात. मागील जन्माची अप्सरा असल्याचे सांगत महिलांमध्ये नैसर्गिक ओढ निर्माण केली. माइंड रीडिंगद्वारे भावनिकआणि मानसिकतेचा फायदा घेत महिलांचे पूजेच्या नावाखाली शोषण केले, अशी कबुली खरातने पोलिस कोठडीत दिली. मात्र, किती महिलांचे शोषण केले, हे आता मला आठवतही नाही असेही त्याने निर्लज्जपणे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे फाटा येथील गाडेनगरमधील ३९ वर्षीय कापड व्यापारी राजेंद्र नानासाहेब भागवत यांना खरातने २ लाख ६० हजारांना गंडा घातला. या प्रकरणी नाशिक येथे दहावा गुन्हा दाखल झाला आहे. आकर्षणाबद्दल महिलांना दोष देणे योग्य नाही महिलांबाबतचा प्रकार संपूर्णपणे स्वेच्छेने घडला नाही. ही मानसिक, भावनिक, सामाजिक प्रभावाची गुंतागुंतआहे. महिला या आधाराच्याआणि भविष्याच्या चिंतेतून गुंतत जातात. गरज पूर्ण होत नाही तिथे चुकीच्या ठिकाणीआकर्षण निर्माण होऊ शकते. विश्वासासोबत मर्यादांची जाणीव असणे गरजेचेआहे. महिलांना दोष देणे योग्य नाही. शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू भोंदू खरातचा शस्त्र परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. उत्तरासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसीत नमूद केले आहे की, खरातवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. म्हणून त्याच्याकडे शस्त्र असणे हे सार्वजनिक शांतता, सुरक्षेसाठी अत्यंत धोकेदायक आहे. या शस्त्राचा वापर करून तो फिर्यादी किंवा साक्षीदारांना धमकावण्याची दाट शक्यता असल्याने, तो शस्त्र धारण करण्यास पूर्णपणे ‘अयोग्य’ ठरत आहे. खरातला २०१२ मध्ये शस्त्र परवाना मिळाला. मात्र, या परवान्याची नोंद केवळ महसूल विभागाकडेच आहे. पोलिस दप्तरी नोंद नसताना हा परवाना कसा मिळाला. त्याचे नूतनीकरण कसे झाले, याचा शोध आता पोलिस, महसूल प्रशासन संयुक्तपणे घेत आहे. सोन्याच्या सांगून दिल्या होत्या तांब्याच्या अंगठ्या अहिल्यानगर | नेवासा येथील कापड व्यावसायिक भागवत यांना डिसेंबर २०२२ मध्ये व्यवसायाबाबत चिंता होती. त्यांच्या काकाने त्यांना खरातकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पत्नीसोबत ते खरातकडे नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकर्स लँड डेव्हलपर्स येथे गेले. खरातने खडे बसवून देतो, असे सांगत भागवत यांच्याकडून सुमारे २० ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या घेतल्या व बदल्यात धातूच्या बनावट अंगठ्या दिल्या. २ लाख ६२ हजार रुपये लुबाडले. १९ मार्च रोजी खरातविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच त्यांनी सराफाकडे त्या अंगठ्या तपासल्या असता त्या तांब्याची निघाल्या. त्यात खडा नव्हे, चिंचोका असल्याचे समजले. दिव्य मराठी ॲनालिसिस खरात हा केवळ भोंदू नव्हता, तर तो ‘माइंड रीडिंग’मध्ये तरबेज होता. महिलांच्या भावनिक आणि मानसिक परिस्थितीचा अंदाज घेऊन तो त्यांना संमोहित करायचा. गोड बोलून, तिची तारीफ करून ऊर्जा हस्तांतरणाच्या नावाखाली तो महिलांचे शारीरिक शोषण करायचा. कौटुंबिक आणि आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना तो ‘टार्गेट’ करत असे, हे आता त्याने पोलिस कोठडीत दिलेल्या जबाबातून स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे. एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर अमित घावटे, अधिकारी आकाश मलिक आणि नवी मुंबई अँटी-नार्कोटिक्स सेलचे वरिष्ठ पीआय संदीप निगडे या तिघांवर एफआयआर दाखल झाला आहे. मुलगा नवीनच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणाचा तपास करताना या अधिकाऱ्यांनी गुरुनाथ यांना वारंवार बोलावून त्यांचा अतोनात मानसिक छळ केला. तसेच हे प्रकरण मिटवण्यासाठी १० ते १५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. याच त्रासाला कंटाळून चिचकर यांनी २५ एप्रिल २०२५ रोजी बेलापूर येथील कार्यालयात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. तीन पानांच्या सुसाइड नोटमध्ये लिहिली नावे आत्महत्येपूर्वी चिचकर यांनी लिहिलेल्या ३ पानांच्या पत्रात या तिन्ही अधिकाऱ्यांच्या नावांचा आणि त्यांनी दिलेल्या त्रासाचा स्पष्ट उल्लेख केला. सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाली, मात्र न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यावर एनआरआय कोस्टल पोलिसांनी कारवाई केली आहे.
छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला जाणाऱ्या विमान प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच गैरसोयीची बातमी आहे. इंडिगो एअरलाईन्सने २९ मार्च ते २४ ऑक्टोबर दरम्यानचे आपले उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले असून, यामध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. आता रात्रीचे मुंबईला जाणारे विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाऐवजी थेट नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे. या निर्णयामुळे दक्षिण मुंबईत किंवा मंत्रालयात जाणाऱ्या प्रवाशांना किमान ४० किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागणार असून, त्यांच्या वेळेत आणि खर्चात मोठी वाढ होणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार, नवी मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला येणारे विमान (6E5027) सायंकाळी ७:३० वाजता उड्डाण करून रात्री ८:२५ वाजता पोहोचेल. तर परतीचे विमान (6E6093) रात्री ८:५५ वाजता उड्डाण करून रात्री ९:५० वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरेल. शहरातून मुंबईला, विशेषतः मंत्रालयाच्या कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. विमानतळ बदलल्यामुळे वेळेची बचत होण्याऐवजी प्रवास अधिकच लांबणार असल्याने, प्रवासी संख्येवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयावर शहरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी या बदलाचे स्वागत केले आहे. “नवी मुंबई आणि जुन्या विमानतळावरून मंत्रालयापर्यंत पोहोचण्यास साधारण सारखाच वेळ लागेल, नवीन विमानसेवांसाठी हे फायदेशीर ठरेल,’ असे सावे म्हणाले. तर, संभाजीनगर विमानतळ संचालक शरद येवले यांनी या नवीन सेवेचा नेमका परिणाम आठवडाभरात स्पष्ट होईल, अशी भूमिका मांडली आहे. मात्र, उद्योजक आणि विमान प्रवाशांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड म्हणाले की, “शहरातून विदेशात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नवी मुंबईहून आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी मिळण्यात अडचणी येतील. तसेच रात्रीच्या वेळी मंत्रालयाच्या कामासाठी जाणाऱ्यांना ही सेवा अत्यंत गैरसोयीची ठरणार आहे.” नवी मुंबईतून दक्षिण मुंबई गाठण्यासाठी कसरत नवी मुंबई विमानतळावरून रात्री १० वाजता उतरल्यानंतर दक्षिण मुंबईतील मंत्रालयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना आता मोठी कसरत करावी लागेल: नवी मुंबईहून संभाजीनगरसह ४६ शहरांना विमान सेवा नवी मुंबई | देशातील महत्त्वाच्या ग्रीनफिल्ड विमानतळांपैकी एक असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) पहिले उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले. रविवारपासून लागू या वेळापत्रकात ३० नवीन देशांतर्गत मार्गांचा समावेश आहे. त्यामुळे आता या विमानतळाची कनेक्टिव्हिटी छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरसह देशातील एकूण ४६ शहरांपर्यंत विस्तारली आहे. यात भोपाळ, अयोध्या, श्रीनगर, आग्रा आणि वाराणसी यासारख्या शहरांचा समावेश आहे. एप्रिल २०२६ पर्यंत नवी मुंबईहून रोज १५६ उड्डाणे : नव्या वेळापत्रकासह नवी मुंबई विमानतळावरून एप्रिल २०२६ पर्यंत दैनंदिन उड्डाणांची संख्या २२ वरून १५६ पर्यंत वाढवली जाणार आहे. वाढीव अंतर आणि वेळ जुन्या विमानतळाच्या तुलनेत अटल सेतूमार्गे हे अंतर सुमारे ३९ ते ४० किलोमीटरने अधिक आहे. मात्र, मुंबईत सुरू असलेली उड्डाणपुलांची कामे व वाहतूक कोंडीमुळे प्रवासाला प्रत्यक्षात १.५ ते २ तास लागू शकतात. खिशाला फटका अटल सेतूचा एकेरी टोल (अंदाजे २५० रुपये) व टॅक्सीचे वाढीव अंतर यामुळे प्रवाशांना ५०० ते ७०० रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड पडेल.
आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा ८ जुलै रोजी पंढरपूरला प्रस्थान ठेवणार आहे. १९ जुलैला सोहळा जिल्ह्यात प्रवेश करेल. १७ दिवस मुक्काम, ४ गोल तर ३ उभे रिंगण होणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी दिली आहे. आळंदी येथून यंदा दुपारी ३ वाजता सोहळा प्रस्थान ठेवेल. आषाढी एकादशी २५ जुलै रोजी साजरी होणार आहे. चैत्र शुद्ध दशमीला प्रथानुसार पंढरपूरच्या संत ज्ञानेश्वर महाराज मठात आळंदी संस्थानची बैठक पार पाडली. अधिक मासानिमित्ताने या वर्षी १५ ते २० दिवस सोहळा पुढे गेला आहे. त्याच दरम्यान मोठा पाऊस पडण्याची शक्यता अधिक असते. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेकडो मैल पायी चालत सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यास भाविक आसुसलेला असतो. प्रशासनाने सुरू केले नियोजन मागील वर्षी प्रशासनाने वारी सोहळ्याचे अचूक नियोजन केले होते. यंदाही तसेच नियोजन सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे पालखी सोहळ्यात ४३ ठिकाणी जर्मन हँगर मंडप, १०९ ठिकाणी वॉटरप्रूफ तंबू उभारले होते. सोहळ्याचे नियोजन ८ जुलै आळंदी येथून प्रस्थान, ९ व १० जुलै पुण्यात मुक्काम, ११ व १२ जुलै सासवड मुक्कामी, १३ जुलै रोजी जेजुरी, १४ जुलै रोजी वाल्हे मुक्कामी राहणार आहे. १५ जुलै रोजी नीरा स्नान करून पालखी लोणंद येथे मुक्कमी पुढे, १६ जुलै रोजी लोणंद येथून पुढे दुपारी पालखी चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होऊन पालखी तरडगाव येथे मुक्कामी येणार आहे.
शहरातील उच्चभ्रू वस्ती कर्मयोगीनगरमधील त्या आलिशान बंगल्यासमोरून जाताना आजही अंगावर काटा येतो. ज्या परिसरात तीन-तीन माजी आमदार वास्तव्यास आहेत, त्याच गल्लीत २०१२ च्या सुमारास भोंदू कॅप्टन खरातने ५ कोटींहून अधिक खर्च करून आपला महाल उभा केला. तृप्तबाला नाव असलेला हा बंगला केवळ त्याच्या भव्यतेसाठी नाही, तर तिथे चालणाऱ्या काळपट कृत्यांमुळे कायमच संशयाच्या भोवऱ्यात राहिला. आता लैंगिक अत्याचाराचे गंभीर पाश समोर आल्यानंतर, या बंगल्याच्या भिंतींमागे दडलेली अनेक काळी रहस्ये उघड होऊ लागली आहेत. एरव्ही खरातच्या कुटुंबातील सदस्यांचा वावर असलेल्या या बंगल्याचे रूप अमावास्येच्या रात्री पूर्णपणे पालटायचे. “अमावास्येच्या रात्री या बंगल्याबाहेर महागड्या चारचाकी वाहनांच्या रांगा लागायच्या, असे एका स्थानिक नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘दिव्य मराठी’ शी बोलताना सांगितले. राजकीय नेते, बडे अधिकारी आणि आपली ओळख लपवू पाहणारे व्हीआयपी लोक खरातच्या अधिकृत कार्यालयात न जाता, चोरट्या पावलांनी थेट या बंगल्याची पायरी चढायचे. रात्रीच्या काळोखात रंगणाऱ्या या दरबारात नक्की काय चालायचे याची चर्चा आता संपूर्ण नाशिकमध्ये वाऱ्यासारखी पसरली आहे. कॅप्टन खरातच्या लैंगिक अत्याचाराचे पाप चव्हाट्यावर आल्यानंतर कर्मयोगीनगरमधील चित्र बदलले आहे. ज्या बंगल्याकडे लोक कधीकाळी कुतूहलाने पाहायचे, तिथे आता भीती आणि संतापाचे वातावरण आहे. देशभक्तीचा देखावा, स्वच्छ प्रतिमेचा आव, केबिनमध्येच अत्याचाराचा डाव नाशिक | देशभक्तीच्या गप्पा, भिंतीवरील तिरंगा आणि हरिवंशराय बच्चन यांची ‘कोशिश करने वालों की हार नहीं होती’ ही प्रेरणादायी कविता... हे चित्र एखाद्या स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीच्या कार्यालयाचे असावे असेच कुणालाही वाटेल. पण कॅनडा कॉर्नरमधील हे २१० चौरस फुटांचे कार्यालय म्हणजे भोंदू अशोक खरातचा महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा अड्डा बनले होते. रॅगिंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी बेड्या ठोकलेल्या कॅप्टन खरातने याच झेड ब्लॅक काचांच्या आड महिलांचे शोषण करत आपल्या विकृत वासनेचा बाजार मांडला होता. त्याच्या या कार्यालयाची शनिवारी २८ मार्च रोजी फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांनी कसून तपासणी केली. खरातच्या कार्यालयात तिरंगा व प्रेरणादायी कविता लोकांचे भविष्य सांगण्याबरोबरच खरातने आपल्या कार्यालयाची रचना अत्यंत धूर्तपणे केली होती. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना आपण किती स्वच्छ प्रतिमेचे आहोत हे दाखवण्यासाठी त्याने दर्शनी भागात राष्ट्रध्वज आणि प्रेरणादायी सुविचार लावले होते. कुत्र्यांच्या भीतीने परिसरातील नागरिक भयभीत लाखोंचे विदेशी कुत्रे खरातने केवळ बंगल्याची तटबंदीच मजबूत केली नव्हती, तर सुरक्षेच्या नावाखाली तिथे दहशतीचे एक अदृश्य साम्राज्य निर्माण केले होते. बंगल्याच्या आवारात लाखो रुपये किमतीचे दोन विदेशी जातीचे कुत्रे पाळण्यात आले होते. या कुत्र्यांच्या भीतीने परिसरातील नागरिक या बंगल्याच्या साध्या सावलीलाही उभे राहण्याचे धाडस करत नसत. एक प्रकारे या श्वानांचा वापर करून खरातने आपल्या काळ्या कारनाम्यांभोवती दहशतीचे कुंपणच तयार केले होते, असे स्पष्टपणे जाणवते. यामुळे या परिसरात त्याची मोठी चर्चा कायमच असायची. नागरिकांची गर्दी खरातला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी हे कार्यालय सील केले आहे. शनिवारी पोलिस आणि फॉरेन्सिक टीमचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी या कार्यालयाची तपासणी सुरू केली. काय कारवाई होते हे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भविष्य जाणून घेण्याच्या नावाखाली या कार्यालयात सुरू असलेल्या काळ्या कृत्यांची आणि खरातच्या भोंदूपणाची नागरिकांत चर्चा रंगली.
महाराष्ट्रात २०२१-२२ ते २०२४-२५ या ४ शैक्षणिक वर्षांत ६२४ सरकारी मराठी शाळा बंद झाल्यात. म्हणजेच वर्षाला १५६ तर महिन्याला १३ मराठी शाळा बंद झाल्यात. याउलट इंग्रजी शाळांना मात्र सरकार ‘रेड कार्पेट’ टाकत आहे. याच ४ वर्षांत ४२६ इंग्रजी शाळा सुरू झाल्यात. वर्षाला १०६ तर महिन्याकाठी ९ इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत. देशातही याच कालावधीत १८,७२७ सरकारी शाळा बंद झाल्यात. ८,४०० खासगी इंग्रजी सुरू झाल्यात. देशातही इंग्रजी शाळेत प्रवेशाचा आकडा दोनच वर्षांत ८.४२ कोटींवरून ९.५९ कोटींवर पोहोचला आहे. राज्यात मराठी माध्यमातील विद्यार्थी २ लाखांनी घटलेत. तुलनेने इंग्रजीचे विद्यार्थी ३ लाखांहून अधिक वाढलेत. तज्ज्ञ शिक्षकांचा आभाव, पायाभुत सुविधांकडे सरकारच्या दुर्लक्षामुळे पालकांचा कल आता पाल्यांना इंग्रजी शाळेत शिकवण्याकडे आहे. २ वर्षांत कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात २५५ मराठी शाळा बंद पडल्या आहेत. मराठी शाळा बंद होण्याची 4 कारणे पालकांचा कल इंग्रजी कडे वाढल्याने मराठीची पटसंख्या घटली. सरकारी अन् खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची भरती न होणे. सरकारी आणि मराठी शाळांना पायाभूत सुविधांचा आभाव. राज्य शासनाचा सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन दुय्यम असणे. पटसंख्येअभावी राज्यात महिन्याकाठी १३ शाळांना लागतेय टाळे 1. छत्रपती संभाजीनगर : मागील ४ वर्षांत ४२ इंग्रजी शाळांना परवानगी मिळाली आहे. तुलनेने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ११० मराठी शाळांचे क्लस्टरमध्ये समायोजन केले आहे. 2. नाशिक : शहरीकरण वेगाने होत असल्याने इंग्रजी शाळांच्या संख्येत मोठी वाढ झाली. तुलनेने मराठी शाळांच्या संख्येत घट झाली. इंग्रजी शाळांची संख्या १० ते १२ टक्यांनी वाढली. 3. जळगाव : जिल्ह्यात मराठी शाळांचा संख्या स्थिर आहे. उत्तर महाराष्ट्रातून इंग्रजी शाळांसाठी आलेले नवे प्रस्ताव सर्वाधिक जळगावचेच आहेत. 4.सोलापूर : शहरात इंग्रजी शाळांचे प्रमाण ८ टक्यांनी वाढले. मात्र कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरील हा जिल्हा असल्याने मराठी शाळा टिकवण्याचे आव्हान अधिक आहे. नाशिकला सर्वाधिक ८२ शाळांना टाळे जिल्हा मराठी इंग्रजी मराठी बंद नव्या इंग्रजीसंभाजीनगर ४,२८० ७९० ६५ ४२नाशिक ५,४१० ९४० ८२ ५५जळगाव ३,११० ४१० ४८ २८सोलापूर ३,८५० ५३० ५४ ४० केस स्टडी : करमाडच्या दोन शिक्षकी शाळेची पटसंख्या झपाट्याने घटली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाडला एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पूर्वी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत सुमारे ६० ते ७० विद्यार्थी असायचे. दोन शिक्षकी ही शाळा आता डबघाईस आली आहे. २०२५-२६ दरम्यान शाळेत फक्त ७ विद्यार्थी आहेत. त्यात इयत्ता पहिलीत एक, दुसरी आणि तिसरीत प्रत्येकी २, चौथीत २ असे एकूण ७ विद्यार्थी उरलेत. नव्या नियमानुसार २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळाही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ८९ % प्रस्ताव इंग्रजी शाळांचेच आलेत २०२५-२६ दरम्यान राज्यातील मराठी शाळांची संख्या ८५,५३३ झाली. जी वर्ष- २०२२-२३ मध्ये ८६,१५७ होती. म्हणजेच ४ वर्षांत ६२४ मराठी शाळा बंद झाल्यात. विशेष म्हणजे, नव्या शाळांच्या प्रस्तावात ८९% प्रस्ताव इंग्रजीचे आहेत.
दिल्लीत बैठक, कनेक्शनसाठी अटी, शर्थी शिथिल! नवी दिल्ली : वृत्तसंस्था इराण, इस्त्रायल, अमेरिका युद्धाचा परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे. भारतातही काही भागांत गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आता एलपीजी गॅसऐवजी पाणी कनेक्शन, वीज कनेक्शनप्रमाणेच आता पीएनजी कनेक्शनवर भर दिला जाणार आहे. कदाचित यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. दरम्यान, आज […] The post एलपीजीला पीएनजीचा पर्याय! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विदर्भ तापला, पारा ४१ अंशांवर!
ओकोल्यासह अनेक शहरांत सूर्याचा प्रकोप वाढला अकोला : प्रतिनिधी राज्यात उन्हाच्या झळा अधिकच तीव्र झाल्या असून विदर्भातील महत्त्वाच्या शहरांनी ४१ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून सूर्याचा प्रकोप वाढला आहे. विदर्भ सध्या अक्षरश: तळपत असतानाच हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. जोरदार वा-यासह येणा-या या पावसामुळे तापमानात अचानक बदल […] The post विदर्भ तापला, पारा ४१ अंशांवर! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हुथी, हिजबुल्लाहच्या युद्धातील एन्ट्रीने धोका वाढला इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईल हल्ला तेहरान : वृत्तसंस्था अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्धा आता एक महिन्यानंतर अत्यंत भीषण वळणावर पोहोचले आहे. इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर झालेले हल्ले आणि इराणने दिलेले प्रत्युत्तर यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या युद्धात आता येमेनमधील हुथी बंडखोर आणि लेबनॉनमधील हिज्बुल्लाह […] The post जगावर अणुयुद्धाचे संकट! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विजयपत सिंघानिया काळाच्या पडद्याआड
मुंबई : प्रतिनिधी देशातील नामांकित उद्योगपती, रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते विजयपत सिंघानिया यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र आणि रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी दिली. उद्योग, विमानचालन आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान देणा-या या दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने अनेकांनी दु:ख व्यक्त केले. विजयपत सिंघानिया […] The post विजयपत सिंघानिया काळाच्या पडद्याआड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जागतिक क्षयरोग दिनाच्या औचित्याने अमरावती येथील जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयातर्फे टीबी मुक्त भारत अभियान फेज २ चे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजिता महापात्र यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. ज्योत्स्ना पोटपिटे, जिल्हा क्षय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पवार आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड उपस्थित होते. भारत सरकारच्या 'टीबी मुक्त भारत' या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टपूर्तीसाठी या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या अभियानाचे प्रमुख उद्देश्य क्षयरोगाचे लवकर निदान करणे, सर्व रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार पुरवणे, औषधोपचार पूर्ण करण्यावर भर देणे, क्षय रुग्णांचे विशेष व्यवस्थापन करणे, संपर्कातील व्यक्तींची तपासणी करणे आणि टीबी प्रतिबंधात्मक उपचार वाढवणे हे आहे. यासाठी घराघरात जाऊन टीबी स्क्रीनिंग व सर्वेक्षण तसेच जलद तपासणी केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. कुपोषित रुग्णांसाठी पोषण सहाय्य, निक्षय मित्र उपक्रमाद्वारे सामाजिक सहभाग, उच्च जोखमीच्या गटांमध्ये (एचआयव्ही, मधुमेह, कुपोषण) विशेष लक्ष आणि खाजगी वैद्यकीय क्षेत्राचा सक्रिय सहभाग हे या अभियानचे प्रमुख उपक्रम असतील. यावेळी बोलताना सीईओ संजिता महापात्र यांनी सांगितले की, टीबी निर्मूलनासाठी केवळ आरोग्य विभाग नव्हे, तर संपूर्ण समाजाने एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. 'टीबी हरेल देश जिंकेल' या घोषवाक्याखाली सर्वांनी एकत्र येऊन टीबीमुक्त भारत घडविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. डॉ. रुपाली कोरडे व डॉ. संदीप सुखसोहळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विशाल धांडे यांनी केले, तर आभार पुरुषोत्तम खडसे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गो. ग. राठी शासकीय क्षयरोग रुग्णालय आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या समतादूत विभागाचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी समतादुतांना समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे. भारतीय संविधान, थोर समाज सुधारकांचे समतेचे विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन, अट्रॉसिटी ऍक्ट, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय विभागाच्या योजना तसेच बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. अमरावती विभागातील अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ येथील समतादुतांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डॉ. जोगदंड यांनी समतादूतांशी संवाद साधून त्यांना कोणकोणती कामे हाती घ्यावयाची याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, समतादुतांनी प्रत्यक्ष शहरातील प्रत्येक वस्तीत आणि खेड्यापाड्यात जाऊन नागरिकांचे प्रबोधन करावे. समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा व परंपरांचे उच्चाटन करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करावी. विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय साधत गरजू लोकांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. सामाजिक सलोखा व बंधुभाव निर्माण करण्यासाठी समतादुतांनी लोकांचे कल्याणदूत म्हणून काम करावे. येणारी पिढी समताधिष्ठित घडावी, यासाठी बार्टीच्या विविध योजना समाजापर्यंत पोहोचवाव्यात. तसेच सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणाकरिता कार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी वसंत गव्हाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी अनिता गवई-राऊत यांनी केले. यावेळी विभागातील जिल्हा प्रकल्प अधिकारी महेंद्र शामदे व विभागातील सर्व समतादूत उपस्थित होते.
नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने (आयटीआय) महाराष्ट्रातील सर्व आयटीआयमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून या संस्थेची निवड करण्यात आली असून, त्यांना प्रशस्तीपत्रासह २ लाख रुपयांचा रोख पुरस्कारही मिळाला आहे. राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यभर एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल शुक्रवार, २७ मार्च रोजी घोषित करण्यात आला. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील कामकाजाच्या आधारे नांदगाव आयटीआयची निवड करण्यात आली, ज्यामुळे अमरावती जिल्ह्याची मान उंचावली आहे. संस्थेतील प्राचार्य, निदेशक आणि विद्यार्थी यांच्यातील योग्य समन्वयामुळे हे यश शक्य झाले. नाविन्यपूर्ण उपक्रम, अत्याधुनिक सुविधा आणि १०० टक्के प्रवेश क्षमता हे उद्दिष्ट संस्था दरवर्षी गाठते. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासोबतच प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर येथे विशेष भर दिला जातो. या संस्थेत स्मार्ट क्लासरूम, सर्वत्र सीसीटीव्हीची निगराणी, खेळाचे मैदान, जिम आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. तत्कालीन सहसंचालक प्रदीप घुले व विद्यमान सहसंचालक अनंत सोमकुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य नंदनसिंह भुकवाल यांच्या नेतृत्वात ही प्रगती साध्य झाली आहे. प्राचार्य भुकवाल यांनी सांगितले की, हा सन्मान संस्थेतील सर्वांनी केलेल्या सामूहिक कामाचा परिणाम आहे. नांदगाव खंडेश्वर आयटीआयला यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सन २०२१-२२ मध्ये संस्थेला विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामकाजाचा प्रथम पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २०२४ मध्ये मुंबईतील डिपेक्स राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनात आयटीआय गटातून शेतकरी मित्र या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला होता. विभागीय आणि राज्यस्तरावर सलग पुरस्कार पटकावणारी जिल्ह्यातील ही एकमेव आयटीआय ठरली आहे.
ममदापूर सरपंचपदाचे ‘ग्रहण’ अडीच वर्षांनी सुटले:30 मार्चला अधिसूचना, 28 एप्रिलला होणार मतदान
तिवसा तालुक्यातील आखतवाडा आणि वणी ममदापूर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाची निवडणूक अखेर अडीच वर्षांनंतर जाहीर झाली आहे. यामुळे आतापर्यंत सुरू असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, गावातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. प्रशासकीय सूत्रांनुसार, या निवडणुकीची अधिसूचना सोमवार, ३० मार्च रोजी जाहीर होईल. उमेदवारी अर्ज ७ ते १३ एप्रिल दरम्यान दाखल केले जातील. १५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल, तर १७ एप्रिल रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रत्यक्ष मतदान २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडेल. २९ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येईल. या निवडणुकीत थेट सरपंचपदासोबतच ग्रामपंचायतीतील ३ रिक्त सदस्यपदांसाठीही मतदान होणार आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात दोन वेळा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र विविध कारणांमुळे प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण होते. आता अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपद महिलांसाठी राखीव होते. मात्र त्यावेळी एकही उमेदवारी अर्ज न आल्याने निवडणूक होऊ शकली नव्हती. परिणामी सरपंचपद रिक्त राहिले आणि ग्रामपंचायतीचे कामकाज प्रशासकीय पातळीवरच चालत राहिले. वॉर्ड क्रमांक १ मधील महिलांसाठी राखीव असलेली एक जागासुद्धा उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्याने रिक्तच राहिली होती. आता दोन्ही पदांसाठी निवडणूक होत आहे. इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली असून, गावात राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रचाराचे वातावरण हळूहळू रंगू लागले आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराला नवे नेतृत्व मिळाल्याने विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
अमरावती: शहीदांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी देशहिताचे कार्य करावे लागेल, राष्ट्रीय एकात्मता व देशाची विविधता जपावी लागेल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून बुध्दीप्रामाण्यवादी व्हावे, असे आवाहन प्रा. मधुकर जाधव यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात शहीद दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने 'शहीदांच्या स्वप्नातील भारत' या विषयावर या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे होते. अधिसभा सदस्य नितीन टाले व कैलास चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. निलेश कडू आणि विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात प्रा. जाधव यांनी भगतसिंह यांच्यावर लाला लजपतराय यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता हे सांगितले. लाला लजपतराय यांच्या निधनानंतर भगतसिंह यांनी बदला घेतला. असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यामागे भारतीयांचे विचार ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हेतू होता, जीवितहानी करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. चंदनसिंहसारख्या ब्रिटिशांची चाकरी करणाऱ्यांनाही मारण्यात आले होते. भगतसिंह यांनी अटक करवून घेतल्यानंतर कारागृहात भारतीयांना दुय्यम वागणूक मिळत असल्याने त्यांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. ब्रिटिश काळात प्रत्येक बाबीसाठी भारतीयांना आंदोलन करावे लागत होते. बाबू गेणू यांनीही भारतातील कच्चा माल ब्रिटिशांना नेण्यास मनाई केली होती, असे दाखले प्रा. जाधव यांनी दिले. आजच्या युवकांनी आपल्या ज्ञानकौशल्याचा उपयोग समाजहित आणि देशहितासाठी करावा, शहीदांचे चरित्र वाचावे, विचार आत्मसात करावेत आणि ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला. अधिसभा सदस्य नितीन टाले म्हणाले की, क्रांतिकारकांनी तरुण वयातच सर्वस्वाचा त्याग करून देश स्वातंत्र्यासाठी लढा दिला. आजच्या तरुणांनी आपल्यासमोरील आव्हानांना सामोरे जावे. विद्यार्थीही समाजात परिवर्तन घडवून आणू शकतात, असे टाले यांनी नमूद केले. कैलास चव्हाण यांनी सांगितले की, ब्रिटिशांची सत्ता उलथवण्यासाठी क्रांतिकारकांनी मोठे बलिदान दिले. अवघ्या तेवीस वर्षांच्या वयात भगतसिंह यांनी अनेक पुस्तके वाचली आणि अभ्यास केला. लाला लजपतराय यांच्याकडून त्यांनी देशभक्तीचे धडे घेतले. युवकांनी पुस्तके वाचावीत, स्वप्न पहावीत आणि पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी एकही तालुका पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही. यामुळे प्रशासनाने ५४५ गावांना टंचाईग्रस्त घोषित केले असून, या गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी ७२२ विविध कामे निश्चित केली आहेत. या कामांसाठी जिल्हा प्रशासनाला १९ कोटी ७ लाख ५५ हजार रुपये खर्च येणार आहे. जिल्हा परिषदेने गेल्या महिन्यात प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयाकडून पाणीटंचाईच्या वास्तविकतेचा अहवाल मागवला होता. भूजल सर्वेक्षण विभागाने या अहवालाची पडताळणी करून उपाययोजनांची आखणी केली. या आखणीनुसारच १९.०७ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात पाण्याचे स्रोत मर्यादित असल्याने दरवर्षी विहिरींचे खोलीकरण, विहिरींचे अधिग्रहण आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा यांसारख्या उपाययोजना कराव्या लागतात. मात्र, यावर्षी जिल्ह्यातील सर्व चौदाही तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, विहिरींचे खोलीकरण, खासगी विहिरींचे अधिग्रहण, टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या नवीन नळ योजना, नवीन विंधन विहिरींची निर्मिती आणि स्रोतांचे बळकटीकरण अशा विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील काही गावांमध्ये हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईची झळ सुरू होते. त्यामुळे प्रशासनाने यापूर्वी ऑक्टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च असे दोन आराखडे तयार केले होते. परंतु, सर्वाधिक पाणीटंचाई उन्हाळ्यात जाणवत असल्याने, सध्याचा आराखडा जून २०२६ पर्यंतच्या कालावधीसाठी तयार करण्यात आला आहे. चिखलदरा तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याच्या स्रोतांच्या अभावामुळे दरवर्षी टँकर किंवा रस्त्याच्या स्थितीनुसार बैलगाडीने पाणीपुरवठा केला जातो. यावर्षीही १५ टँकर आणि बैलगाडीचा वापर करावा लागणार असून, त्यासाठी सुमारे ३० लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. अधिग्रहित विहिरींमधून या दूरच्या गावांना येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरू केला जाईल. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांनी सांगितले की, दरवर्षी काही गावांना बाहेरून पाणी पुरवावे लागते, त्यासाठी आराखडा तयार केला जातो. यावर्षी ५४५ गावांचा टंचाईग्रस्त गावांच्या यादीत समावेश आहे. मात्र, ही गावे कायमस्वरूपी टंचाईग्रस्त नसतात, तर दरवर्षी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे पुढील वर्षी त्यांना फायदा होतो. यामुळे काही गावांमध्ये स्रोतांचे बळकटीकरण होते आणि टंचाईचा कालावधीही कमी होतो.
रिम्पा शिवा यांचे तबला वादन तर पं. कुमार मर्डर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
लातूर : प्रतिनिधी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील संगीत विभागप्रमुख प्रा. हरिसर्वोत्तम जोशी व परिवाराच्या वतीने दि. २५ मार्च रोजी आयोजित ‘स्वर-तालनिनाद’ संगीत समारोह कोलकाता येथील प्रथितयश व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कलावंत विदूषी रिम्पा शिवा यांचे स्वतंत्र तबलावादन, धारवड (कर्नाटक), येथील पं. कुमार मर्डर यांचे शास्त्रीय गायन व लातूर येथील उदयोन्मुख तबलावादक समीहन जोशी यांच्या स्वतंत्र तबलावादनाने […] The post रिम्पा शिवा यांचे तबला वादन तर पं. कुमार मर्डर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विद्यार्थ्यांकडुन प्राचार्य डॉ. गव्हाणे यांचा सत्कार
लातूर : प्रतिनिधी ‘इंडियन टॅलेंट ऑलिंपियाड’चा मानाचा सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांचा महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार विद्यार्थी परिषदेचा सचिव फरदिन शेख, सहसचिव शैलेश जामगे, श्रावणी लगडे, आदित्य सोनकांबळे, विद्यार्थी समन्वयक गणेश गव्हाणे व प्रा. आशिया बेग यांनी अत्यंत देखण्या स्वरूपात […] The post विद्यार्थ्यांकडुन प्राचार्य डॉ. गव्हाणे यांचा सत्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
३ लिटर केरोसीन महिनाभर कसे पुरणार?
लातूर : प्रतिनिधी आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. शासनाने व्यावसायिक गॅस पुरवठा बंद केला आहे. या संकटामुळे निर्माण झालेली घरगुती गॅसची टंचाई दुर करण्यासाठी शासनाने आता केरोसीनचा पर्याय निवडला आहे. लातूर जिल्ह्यातील १ लाख ८ हजार किलोलिटर केरोसीनचा साठा मंजूर केला आहे. येत्या १० दिवसांत ग्रामीण भागातील रास्त भाव दुकानांमधून […] The post ३ लिटर केरोसीन महिनाभर कसे पुरणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जलकुंभ तयार, पाईपलाईन रखडली:19 गावे चार वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत; 35 कोटींची योजना अर्धवट
घाटलाडकी येथे चारगड धरणावरून १९ गावांना पाणी पुरवण्यासाठी ३५ कोटी रुपयांची जल जीवन मिशन योजना रखडली आहे. जलकुंभ तयार असूनही पाईपलाईनचे काम थांबल्याने गेल्या चार वर्षांपासून ही गावे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कंत्राटदाराची देणी थकल्याने योजनेचे काम मध्येच थांबले आहे. केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत २०२२-२३ मध्ये ही योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेमुळे परिसरातील १९ गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या एक वर्षापासून या योजनेचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. कंत्राटदाराची बिले प्रलंबित असल्याने त्यांनी काम बंद केले आहे. उन्हाळा सुरू झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिलांना आणि ग्रामस्थांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने त्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अमरावतीचे उप अभियंता अर्जुन भुंबर यांनी सांगितले की, १९ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे काम निधी अनुपलब्धतेमुळे अर्धवट अवस्थेत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत केंद्राचा निधी उपलब्ध नसल्यामुळे कंत्राटदाराची बिले प्रलंबित आहेत आणि त्यामुळे त्यांनी काम बंद केले आहे.
अमरावतीत ऑक्टोबरमध्ये राज्यस्तरीय ‘बुक फेअर’:पालकमंत्री बावनकुळे यांनी केली घोषणा
अमरावतीमध्ये ऑक्टोबर महिन्यात राज्यस्तरीय पुस्तक महोत्सव (बुक फेअर) आयोजित करण्यात येणार आहे. राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे. पालकमंत्री बावनकुळे यांनी आज, शनिवारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण केले. याचवेळी जिल्हास्तरीय पुस्तक महोत्सवाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील विविध ठिकाणी आयोजित केलेल्या पुस्तक महोत्सवांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादाला पाहूनच अमरावतीत राज्यस्तरीय बुक फेअर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, मानवी जीवनात पुस्तकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुस्तकांमुळे समाज प्रगल्भ होतो आणि अनेक क्रांती घडतात. त्यामुळे जिल्ह्यात वाचन चळवळ रुजवण्यासाठी 'गाव तिथे ग्रंथालय' हा उपक्रम राबवण्यात येईल. या उपक्रमांतर्गत गावांमध्ये असलेल्या विनावापर इमारतींची दुरुस्ती करून त्या ठिकाणी वाचनालये सुरू केली जातील.
मोझरी शेतशिवारात आग, गव्हाचे पीक जळून खाक:महावितरणच्या चुकीमुळे नुकसान झाल्याचा शेतकऱ्याचा आरोप
तिवसा तालुक्यातील मोझरी येथील शेतशिवारात दुपारी अचानक आग लागल्याने दोन एकर गव्हाचे पीक जळून खाक झाले. या घटनेत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी सुधीर होले यांनी महावितरणच्या चुकीमुळे आग लागल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास वाकलेल्या विद्युत खांबामधून ठिणग्या पडल्याने शेतात आग लागली. आगीची माहिती मिळताच शेतकरी सुधीर होले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र, कोरडे वातावरण, वाऱ्याचा वेग आणि पिकाची स्थिती यामुळे आग झपाट्याने पसरली. परिणामी, दोन एकर क्षेत्रातील गव्हाचे पीक पूर्णतः नष्ट झाले. घटनेनंतर महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित विभागाकडून पंचनामाही करण्यात आला असून नुकसानीचे मूल्यांकन सुरू आहे. शेतकरी सुधीर होले यांनी या प्रकरणी तिवसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने, संबंधित शेतकरी आणि परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे योग्य ती नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वाकलेले आणि धोकादायक विद्युत खांब तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
राज्यात सध्या सुरू असलेल्या तीव्र गॅस टंचाईचा फटका आता थेट मानवी जिवावर बेतू लागला आहे. एकीकडे कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झालेले असताना, दुसरीकडे स्वयंपाकाच्या गॅससाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. अशाच एका रांगेत उभ्या असलेल्या अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील एका ७० वर्षीय वृद्धाचा चक्कर येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. शंकरराव शिरसाट असे या मृत वृद्धाचे नाव असून, ते गावाचे माजी सरपंच होते. या घटनेमुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली आहे. अन्वी मिर्झापूर येथील यदुराज गॅस एजन्सीवर सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे देखील आपला नंबर लावण्यासाठी रांगेत उभे होते. एकीकडे भीषण उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे तासन्तास उभे राहिल्याने आलेला थकवा यामुळे त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. उपस्थित नागरिकांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. गावच्या माजी सरपंचाला एका गॅस सिलिंडरसाठी अशा प्रकारे जीव गमवावा लागल्याने अन्वी मिर्झापूर गावावर शोककळा पसरली आहे. व्यवस्थेतील त्रुटी आणि वितरणातील गोंधळामुळेच एका सामान्य नागरिकाचा बळी गेल्याची भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शिरसाटांच्या मृत्युला सरकारची नियोजनशून्यताच जबाबदार या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण होणार असल्याची पूर्वसूचना असतानाही सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. जर प्रशासनाने वेळेवर योग्य नियोजन केले असते, तर आज शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या मृत्यूला पूर्णपणे सरकारची नियोजनशून्यताच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा मी धिक्कार करतो. यापुढे गॅस सिलेंडरसाठी माणसे दगावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशी विनंतीही प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडे केली. नागरिकांची अग्निपरीक्षा राज्यात एकीकडे पारा ४० अंशांच्या वर गेल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे, तर दुसरीकडे घरगुती गॅससाठी भर उन्हात उभे राहावे लागत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस वितरणाचे वेळापत्रक कोलमडले असून, एजन्सी चालकांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. हे ही वाचा… गॅसचा तुटवडा नाही, तर रॉकेल का देताय?:भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले - अफवा पसरवण्यात भाजपचा हात कुणीच धरू शकत नाही राज्यातील इंधन टंचाई, गॅसचा तुटवडा आणि वाढत्या भोंदूगिरीच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः देशात कोरोनासारखी स्थिती पुन्हा उद्भवू शकते असे सांगून इशारा देत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील मुख्यमंत्री कशाचाही तुटवडा नसल्याच्या बढाया मारत आहेत, अशा शब्दांत जाधवांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील विसंगतीवर बोट ठेवले. तसेच गॅसचा तुटवडा नाही म्हणता, मग केरोसिन का देता? असा सवाल करत, अफवा पसरवण्यात भाजपचा कोणीही हात धरू शकत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. सविस्तर वाचा…
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांचा सन्मान
लातूर : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राबविलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणा-या राज्यातील पहिल्या पाच जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थान पटकावले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा शनिवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात सन्मान करण्यात आला. यावेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री […] The post मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांचा सन्मान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘बीएलओं’कडे माहिती न दिल्यास नाव वगळले जाणार
लातूर : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनामार्फत मतदार यादीचे विशेष सघन पुनरावलोकन (एसआयआर) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत मतदारांनी ‘बीएलओ’कडे माहिती न दिल्यास मतदार यादीतील नाव वगळले जाण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील अस्पष्ट फोटो, दुबार नावे आणि ‘एसआयआर […] The post ‘बीएलओं’कडे माहिती न दिल्यास नाव वगळले जाणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली शहरालगत तिरुपती नगर भागातील राजर्षी शाहू आर्टस्, कॉमर्स, सायन्स व आयटी कॉलेजच्या इमारतीला शनिवारी ता. २८ रात्री सात वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली असून या आगीमध्ये कार्यालयातील सर्व साहित्य व संगणक लॅब जळून खाक झाली आहे. शार्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. हिंगोली शहरालगत तिरुपती नगर भागात एशिया ग्रूप महिला मंडळ जालनाद्वारा संचलित राजर्षी शाहू आर्टस्, कॉमर्स, सायन्स व आयटी कॉलेज आहे. या ठिकाणी सुमारे ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. या कॉलेजमध्ये अत्याधुनिक संगणक लॅब आहे. नेहमी प्रमाणे आज या कॉलेजमध्ये सकाळी विद्यार्थ्यांचे वर्ग झाले. त्यानंतर रात्री सात वाजण्याच्या सुमारास कॉलेजच्या कार्यालयास अचानक आग लागली. कार्यालयातून आगीचे लोळ उठल्यानंतर परिसरात धूर निघू लागला. पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण केले. त्यानंतर कार्यालयात लागलेली आग संगणक लॅब पर्यंत पसरली. या कॉलेजला आग लागल्याचे लक्षात येताच माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी तातडीने हिंगोली पालिकेला माहिती दिली. पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, अग्नीशमनदल प्रमुख अक्षय तांडेल, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह पथकाने अग्नीशमनदलास घटनास्थळी रवाना केले. तसेच पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे, संतोष करे, शेख मुजीब, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, जोगे, शंकर ठोंबरे, संजय मार्के यांच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. दोन तासांनंतर आग आटोक्यात अग्नीशमन दल व पोलिसांच्या पथकाने आगीवर पाणी ओतण्यास सुरवात केली. सुमारे दोन तासानंतर आग काही प्रमाणात आटोक्यात आली. मात्र तो पर्यंत कार्यालयातील सर्व दस्ताऐवज व संगणक तसेच संगणक लॅब मधील सर्व १० पेक्षा अधिक संगणक जळून खाक झाले. शार्ट सर्किटमुळे आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या आगीमध्ये कॉलेजचे सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याच अंदाज संस्थेचे अध्यक्ष आसेफ कुरेशी यांनी व्यक्त केला आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण, समाजकल्याण आणि इतर दोन विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक येत्या ४ एप्रिल रोजी होणार असून, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. या पार्श्वभूमीवर २० मार्च रोजी झालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती आणि प्रशासनाची नामुष्की टाळण्याचे मोठे आव्हान आता जिल्हा प्रशासनासमोर उभे आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपने बहुमत नसतानाही अनपेक्षितपणे विजय खेचून आणला खरा, मात्र त्यावेळी झालेल्या गोंधळ आणि मंत्र्यामंत्र्यांमध्ये आणि पोलीस मंत्र्यांमध्ये जिल्ह्याची संपूर्ण राज्यामध्ये मोठी नाचक्की झाली. या संघर्षाची आग अजूनही शांत झालेली नसतानाच आता पुन्हा एकदा सातारा जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दि ४ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडेल. यापूर्वीच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असताना, आता ४ एप्रिलला जिल्हाधिकारी जिल्हा परिषद परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करणार काय याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ जागांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले होते.ज्याचा निकाल ९ फेब्रुवारीला जाहीर झाला. या निकालात २७ जागांसह भाजप जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. तर राष्ट्रवादी काँग्रेसला २० आणि शिवसेना (शिंदे गट) १५ जागांवर विजय मिळवता आला. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती असली तरी, जिल्ह्यात मात्र ही युती न झाल्याने भाजप विरुद्ध शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी असा तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. प्रचारादरम्यान एकमेकांवर झालेल्या जहरी टीकेमुळे निकालानंतरही भाजप आणि मित्रपक्षांत युती होण्याची शक्यता मावळली होती. मात्र, कोणत्याही परिस्थितीत सत्ता स्थापन करण्याचा चंग भाजपने बांधला होता. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ३३ सदस्यांचे पाठबळ मिळवण्यासाठी साम-दाम-दंड-भेदाचा वापर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. सत्ता स्थापनेच्या दिवशी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांना सुरक्षित स्थळावरून बसद्वारे जिल्हा परिषदेत आणले जात असताना भाजपने नाट्यमयरित्या दोन सदस्यांवर अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना जिल्हा परिषदेच्या दारात पोहोचताच पोलिसांनी ताब्यात घेतले. या गोंधळात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे आरोप झाले. प्रचंड गदारोळात राष्ट्रवादीच्या एका सदस्याचा हात जबरदस्तीने वर करून भाजपने सत्ता हस्तगत केली, ज्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. ही घटना ताजी असतानाच आता आहे. जिल्हा परिषदेत सभापती निवड होत असल्याने पुन्हा बहुमताचा विषय येणार असल्याने भाजपा आणि शिवसेना राष्ट्रवादी यामधील संघर्ष होणार की चर्चेद्वारे सभापती निवडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून उलट आमचेच अपहरण करत खूनाचा प्रयत्न करणाऱ्या संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले. सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांची भेट घेतल्यानंतर जिल्हाधिकारी पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यानंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी ही माहिती दिली. अनिल देसाई म्हणाले, ''ज्यांचे अपहरण झाले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला त्या बापूसाहेब शिंदे यांनी त्या दिवशी प्रत्यक्ष मतदानात सहभागी होत मतदान केले होते. तसेच त्यांनी पोलिसांसमोर आपले अपहरण झाले नसल्याचा जबाब दिला आहे. त्यामुळे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून मारहाण करणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.'' ते पुढे म्हणाले की, ''या प्रकरणी न्यायालयानेही योग्य तो आदेश दिलेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्या आदेशानुसार त्वरित कारवाई करावी. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनाही यासंदर्भात निवेदन देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.'' अनिल देसाई यांनी स्पष्ट केले की, संबंधितांवर कारवाई करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी जावे लागेल तेथे जाणार असून, प्रसंगी उच्च न्यायालयातही दाद मागणार आहोत. ''कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,'' असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यातील शेतकरी आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून राष्ट्रवादी किसान सभा काम करणार असून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष वसंत मानकर यांनी शनिवारी ता. २८ दिली आहे. राष्ट्रवादी किसान सभा पदाधिकारी व शेतकरी संवाद मेळावा सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वसंत मानकर यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, वसंत मस्के,राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा प्रदेश सरचिटणीस गणेश डोंगरे, किसान सभेचे मराठवाडा अध्यक्ष रामभाऊ हांडोळे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, रवींद्र गडदे, अशोक शिरामे, रवी डोरले, विकास शिंदे, अजय भूतनर यांच्यासह अनेक कार्यकते उपस्थित होते. यावेळी मानकर म्हणाले की, किसान सभा ही संघटना राज्यात शेतकरी आणि सरकार त्यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करून त्यावर शासनाच्या माध्यमातून उपाययोजना राबवण्यासाठी किसान सभा सक्रिय भूमिका बजावेल. शेतकरी व सरकार त्यांच्यात समन्वय साधत त्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. या प्रश्नासंदर्भात लवकरच शासन स्तरावर संबंधित विभागांना कळविले जाईल. यातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या आदेशानुसार हिंजवडी येथील मे. श्री लक्ष्मी भारतगॅस या गॅस एजन्सीला व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा व वितरण तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या एजन्सीकडे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मार्फत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर विक्रीचा अधिकृत परवाना आहे. मात्र, दि. २६ मार्च २०२६ रोजी सिलेंडर वितरण करताना शासनाने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमाचे पालन न करता अनधिकृत व नोंदणी नसलेल्या व्यक्तींना सिलेंडर वाटप केल्याचे आढळले. तसेच अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने जादा दराने सिलेंडर विक्री केल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एलपीजी पुरवठ्याबाबत गैरसमज निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार संबंधित एजन्सीचा परवाना निलंबित करण्यात येत आहे. तसेच, या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) यांना दिले आहेत. भाजप नेत्याच्या पंपावर कारवाई दरम्यान, इंधन उपलब्धतेबाबत अप्रमाणित माहिती पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण केल्याप्रकरणी पुणे कॅन्टोनमेंट परिसरातील हायवे पेट्रोलियम सेंटर (पूलगेट) या पेट्रोल पंपावरील विक्री व इंधन पुरवठा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे. संबंधित पेट्रोल पंप हा भाजप नेते आणि ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे कोर कमिटी मेंबर अली दारूवाला यांचा आहे. याबाबत अली दारूवाला यांना विचारणा केली असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तेल कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित पेट्रोल पंपाकडून पेट्रोल व डिझेल तुटवड्याबाबत निराधार अफवा पसरविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाइन्स २०२४ अंतर्गत “गंभीर अनियमितता” म्हणून गणली जाते. डीलरशिप करारातील अटींचे उल्लंघन झाल्याने संबंधित कारवाई करण्यात आली आहे.
शेतात मिरची तोडत असताना अचानक पट्टेदार वाघाने महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना २८ मार्च रोजी सकाळच्या सुमारास उमरझरी येथे घडली. माया रामकृष्ण सोनवाणे (वय ५५,रा. उमरझरी, ता.साकोली) असे जखमी महिलेचे नाव आहे. शनिवार दिनांक २८ मार्चला सकाळी नऊ वाजता शेतात मिरच्या तोडत असताना पट्टेदार वाघाने अचानक महिलेवर हल्ला करून जखमी केले. जवळच काम करणारे तिचे पती रामकृष्ण सोनवाणे यांनी जोराने आरडाओरडा केली. लगेच आजूबाजूच्या शेतात काम करणारे सर्व शेतकरी धावून आल्याने वाघ पळाला. परंतु यात माया सोनवणे या वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उमरझरी येथील सोनवणे यांची जंगलालगत अर्धा एकर शेतजमीन असून त्यांनी त्यात मिरचीचे पिक लावले आहे. सध्या मिरची तोडण्याचा हंगाम सुरू असून सकाळी आठ वाजता माया सोनवणे व तिचे पती हे दोघेही शेतात मिरच्या तोडत असताना अचानक वाघाने माया सोनवणे यांच्यावर हल्ला केला. गळ्याला, हाताला व कानाला तसेच पाठीला नखाने ओरडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलेला वनविभागाकडून उपचारासाठी १० हजार रुपये तत्काळ देण्यात आले आहेत. उमरझरी बीट अंतर्गत येणाऱ्या शेतात भरदिवसा वाघांनी हल्ला केल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांतील दुसरी घटना दरम्यान, दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. याआधी १९ मार्च रोजी याच परिसरातील बांपेवाडा येथील वसंता मेश्राम हे मोहफूल वेचायला गेले असता त्यांना वाघाने हल्ला करून ठार केले होते. वाघाला पकडण्यासाठी वनविभाग ॲक्शन मोडवर बांपेवाडा येथील वसंता मेश्राम यांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या नरभक्षी वाघानेच हा हल्ला केला असल्याचा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे. या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी परिसरात पिंजरे लावण्यात आले असून मचाण उभारण्याचे काम सुरू आहे. सोबतच ट्रॅप कॅमेरे व लाईव्ह कॅमेरे सुद्धा लावण्यात आले असल्याचे वन विभागाने सांगितले. शीघ्र कृती दल भंडाराचे शार्पशूटर व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून वाघाचा शोध घेणे सुरू असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना मदत करण्याच्या उपक्रमांतर्गत एका नवजात बाळाच्या उपचारासाठी आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. डॉ. रिंकू मोरे-बावसकर यांच्या प्रयत्नांमुळे बाळाच्या उपचाराचे ₹१.२५ लाखांचे बिल कमी होऊन ते केवळ ₹१५ हजार झाले. पूजा रोहित मुळे यांच्या नवजात बाळाला गंभीर अवस्थेमुळे एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, बाळाचे एकूण बिल सुमारे ₹१.२५ लाख इतके झाले होते, जे मुळे कुटुंबासाठी भरणे शक्य नव्हते. या कठीण परिस्थितीत, वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर सेल अध्यक्ष, पुणे येथील डॉ. रिंकू मोरे-बावसकर यांनी तत्परतेने पुढाकार घेतला. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा केली आणि मानवी दृष्टिकोनातून हे प्रकरण मांडले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि हॉस्पिटल प्रशासनाने बिलात मोठी सवलत दिली. यामुळे एक लाख पंचवीस हजार रुपयांचे बिल कमी होऊन कुटुंबाला केवळ ₹१५ हजार इतकीच रक्कम भरावी लागली. दिलासादायक बाब म्हणजे, नवजात बाळाची प्रकृती सुधारली असून त्याला यशस्वीरित्या डिस्चार्ज देण्यात आला आहे. या मदतीमुळे मुळे कुटुंबाने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि डॉ. रिंकू मोरे-बावसकर यांचे आभार मानले आहेत. नवजात बाळाचे वडील रोहित मुळे यांनी सांगितले की, अत्यंत कठीण प्रसंगी त्यांनी आम्हाला मोठा आधार दिला. त्यांच्या मदतीमुळे आमच्या बाळाला नवजीवन मिळाले आणि आम्हाला आर्थिक दिलासा मिळाला. ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरली आहे.
पुणे विमानतळ देशात अव्वल:प्रवासी समाधान आणि सेवा गुणवत्तेत पटकावला प्रथम क्रमांक
देशातील सर्व विमानतळांवर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवांची गुणवत्ता आणि त्यांच्या समाधानाबाबत झालेल्या सर्वेक्षणात पुणे विमानतळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यात पुणे विमानतळ देशात सर्वोत्तम ठरले आहे. सातत्यपूर्ण सेवा सुधारणा, प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सुविधा आणि कार्यक्षम व्यवस्थापनामुळे पुणे विमानतळाने हा बहुमान मिळविला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, पुणे विमानतळाने सेवा गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत गोवा विमानतळाला द्वितीय, तर इंदूर विमानतळाने तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे पुणे विमानतळाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. देशातील सर्व विमानतळांवर 'एसीआय-एसीक्यू सर्व्हे २०२५' (एअरपोर्ट क्वालिटी सर्व्हे) करण्यात आला. हे सर्वेक्षण पूर्णपणे प्रवाशांच्या अनुभवावर आधारित होते. यामध्ये विमानतळावरील स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश प्रक्रिया (चेक-इन), कर्मचारी वर्गाची वर्तणूक, उपलब्ध सोयी-सुविधा आणि समाधान अशा विविध निकषांचा विचार करण्यात आला. या सर्व आघाड्यांवर पुणे विमानतळाने बाजी मारली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ३१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, ३१ मार्च २०२६ रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. या वेळी पुणे विमानतळाच्या अधिकाऱ्यांना विशेष सन्मानित केले जाणार आहे. याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, 'पुणे विमानतळाने देशात प्रथम क्रमांक मिळवणे ही अभिमानाची बाब आहे. प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. आगामी काळातही पुणे विमानतळ प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध राहील.'
इंधन उपलब्धतेबाबत अप्रमाणित माहिती पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण केल्याप्रकरणी पुणे कॅन्टोनमेंट परिसरातील हायवे पेट्रोलियम सेंटर (पूलगेट) या पेट्रोल पंपावरील विक्री व इंधन पुरवठा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे. संबंधित पेट्रोल पंप हा भाजप नेते आणि ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे कोर कमिटी मेंबर अली दारूवाला यांचा आहे. याबाबत अली दारूवाला यांना विचारणा केली असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तेल कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित पेट्रोल पंपाकडून पेट्रोल व डिझेल तुटवड्याबाबत निराधार अफवा पसरविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाइन्स २०२४ अंतर्गत “गंभीर अनियमितता” म्हणून गणली जाते. डीलरशिप करारातील अटींचे उल्लंघन झाल्याने संबंधित कारवाई करण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत तेल विपणन कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याबाबत जनजागृती केली जात असताना, अप्रमाणित माहिती प्रसारित केल्यामुळे इतर पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी व गोंधळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. सदर पेट्रोल पंप चालकास २४ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास डीलरशिप रद्द करण्यासह पुढील कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे तेल कंपनीच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून देण्यात आली.
भोंदू अशोक खरात प्रकरणात नाव ओढले गेल्याने शिवसेना नेते आणि आमदार दीपक केसरकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक नेत्यांचे खरातसोबतचे फोटो समोर आले आहेत, मात्र केवळ ओळख असणे म्हणजे संबंधित व्यक्तीच्या कृत्यात सहभागी असणे असा होत नाही, अशा शब्दांत केसरकर यांनी आपले स्पष्टीकरण दिले. या प्रकरणाशी आपला संबंध जोडण्याचा प्रयत्न हा केवळ राजकीय द्वेषापोटी केला जात असून, यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आघाडीवर असल्याचा थेट आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. आमदार दीपक केसरकर यांचा नाशिकच्या बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात संबंध असल्याचा आरोप होत आहे. दीपक केसरकर यांचे अशोक खरात याच्यासोबतचे काही फोटो देखील समोर आले आहेत. दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना, त्यांच्या खात्यातील कारभार हा अशोक खरात याच्या सांगण्यावरून होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. आता दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचा समाचार घेतला आहे. नेमके काय म्हणाले दीपक केसरकर? दीपक केसरकर म्हणाले, मी देवभक्त आहे, मी न चुकता शिर्डीला येतो. ते जे ईशान्येश्वर मंदिर आहे ते शिर्डीला येण्याच्या वाटेवर आहे. मी लहान असल्यापासून दर सोमवारी शिव मंदिरात जातो. शिर्डीला आल्यानंतर कुठल्या शिव मंदिरात जायचे? तर मग ईशान्येश्वर मंदिरात जाणे झाले, त्या निमित्ताने ओळख झाली. ओळख आहे म्हणजे त्यांच्या कुठल्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असे नाही. त्यांना वाचवण्यासाठी माझा एखादा फोन गेला असेल, तर मी दोषी आहे. पण त्यांच्याकडून जे चुकीचे कृत्य घडलेले आहे त्याची शिक्षा त्यांना झाली पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. 39 आमदार भेटून गेलेले असताना माझेच नाव का? मी कुठलीही पूजा केलेली नाही. मी फक्त ईशान्येश्वरमध्ये एकदा पूजा केली आहे. याच्या पलीकडे मी कुठलीही पूजा त्यांच्या वतीने केलेली नाही. निव्वळ ओळख असल्याबद्दल एकाबद्दल काहीतरी बोलणे चुकीचे आहे. इतकी लोकं भेटून गेले, जवळजवळ ३९ आमदार भेटून गेले, मग माझंच नाव का? हा प्रश्न आहे. अनेक लोक भेटायला येतात, त्यामुळे कोणासोबत फोटो काढले म्हणजे तो चुकीचा माणूस आहे असे होत नाही. आपल्या नावाचा वापर करून गैरसमज पसरवू नयेत, असे दीपक केसरकर म्हणाले. राजकीय द्वेषापोटी लक्ष्य केल्याचा दावा या प्रकरणाचा संबंध आपल्याशी जोडण्यामागे 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' पक्षाचे नेते, विशेषतः संजय राऊत यांचा हात असल्याचा थेट आरोप केसरकर यांनी केला. ज्यावेळी शिवसेनेत संघर्ष झाला, त्यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू मांडून विरोधकांचे मनसुबे उधळून लावले होते. त्याचा राग मनात धरून आता माझ्याबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे, असे ते म्हणाले. खरातचे कृत्य अत्यंत घृणास्पद असून त्याला कठोर शिक्षा व्हायलाच हवी, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. ठाकरे गटाचा दुटप्पीपणा उघड दीपक केसरकर यांनी यावेळी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्यांनी खरातच्या मंदिराला पाण्याची लाईन दिली, निधी उपलब्ध करून दिला, तेच लोक आज माझ्यावर बोट दाखवत आहेत. त्यांनी केले तर योग्य आणि आम्ही मंदिरात गेलो तर चुकीचे, हा दुटप्पीपणा आहे, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला. खरातच्या गुन्ह्यांची कोणतीही माहिती आपल्याला नव्हती, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार? आपल्या स्वच्छ प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दीपक केसरकर यांनी कायदेशीर इशारा दिला आहे. या प्रकरणात एकदा खरातवर आरोपपत्र दाखल झाले की, माझी खोटी बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कोणती कायदेशीर कारवाई करायची, याबाबत मी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे. सार्वजनिक जीवनातील प्रतिमा मलीन करणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा केसरकर यांनी दिला.
राज्यातील इंधन टंचाई, गॅसचा तुटवडा आणि वाढत्या भोंदूगिरीच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः देशात कोरोनासारखी स्थिती पुन्हा उद्भवू शकते असे सांगून इशारा देत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील मुख्यमंत्री कशाचाही तुटवडा नसल्याच्या बढाया मारत आहेत, अशा शब्दांत जाधवांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील विसंगतीवर बोट ठेवले. तसेच गॅसचा तुटवडा नाही म्हणता, मग केरोसिन का देता? असा सवाल करत, अफवा पसरवण्यात भाजपचा कोणीही हात धरू शकत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक तणावाचा परिणाम भारताच्या इंधन पुरवठ्यावर होत आहे. राज्यातील विविध शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. एलपीजी सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. एलपीजी संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने आता केरोसिन देण्यात येणार आहे. तर देशात आणि राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, एलपीजी गॅस आणि पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. यावरून भास्कर जाधव यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. नेमके काय म्हणाले भास्कर जाधव? राज्यातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरून सरकारला जाब विचारताना भास्कर जाधव म्हणाले की, आज अनेक ठिकाणचे पेट्रोल पंप बंद आहेत आणि गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. जर तुमच्याकडे साठा भरपूर आहे, तर मग राज्यात बंद असलेले केरोसिन रेशनवर देण्याचा निर्णय सरकारने का घेतला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या विधानांमध्ये मोठी तफावत असून, जनतेची दिशाभूल करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. नेहरू-ठाकरेंना जबाबदार न धरल्यामुळे धन्यवाद काँग्रेसच्या काळात साडेतीनशे रुपयांना मिळणारा गॅस आज बाराशे रुपयांच्या पार गेला असूनही भाजपवाले केवळ काँग्रेसवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. आजच्या परिस्थितीला नेहरू किंवा उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असे भाजपने अद्याप म्हटले नाही, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असा उपरोधिक टोलाही भास्कर जाधव यांनी लगावला. देशात २०१४ पासून भोंदूगिरीला खतपाणी राज्यातील वाढत्या भोंदूगिरीच्या प्रकरणांनाही भास्कर जाधव यांनी थेट भाजपच्या विचारसरणीशी जोडले. २०१४ पासून देशात अंधश्रद्धेला जाणीवपूर्वक खतपाणी घातले जात असून, त्यातूनच भोंदूबुवा आणि तथाकथित साधू-महाराजांचे पेव फुटल्याचे त्यांनी नमूद केले. अनेकांना वाटते की बाबा-बुवांच्या पाया पडल्याशिवाय सत्तेचा मुकुट मिळणार नाही. राजकारण्यांच्या अशा वर्तनामुळे सर्वसामान्य जनतेमध्येही चमत्कारांवर विश्वास ठेवण्याची चुकीची प्रवृत्ती बळावत आहे. सिन्नरचे अशोक खरात प्रकरण हा याच विकृत मानसिकतेचा एक भाग आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. राजसत्ता आणि धर्मसत्तेची गल्लत भास्कर जाधव यांनी राजसत्ता आणि धर्मसत्ता या वेगवेगळ्या असायला हव्यात, असे मत व्यक्त केले. जेव्हा राजकारणी आपल्या सत्तेसाठी धर्माचा आणि अंधश्रद्धेचा वापर करतात, तेव्हा त्यांचा विवेक नष्ट होतो. अशा अघोरी प्रवृत्तींमुळे राज्याची प्रतिमा मलीन होत असून, सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी आणि जनतेला इंधन टंचाईतून दिलासा मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलिस दलाने २०० पैकी १४५ गुण मिळवत राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात या दलाने प्रथम क्रमांक मिळवला. मुंबईतील सह्याद्री सभागृहात आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा गौरव करण्यात आला. या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलिस विभागातील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवांचे मूल्यमापन करण्यात आले. डिजिटल प्रणालींचा वापर, ऑनलाइन सेवा, डेटा व्यवस्थापन, डॅशबोर्ड मॉनिटरिंग आणि तंत्रज्ञानाधारित निर्णयप्रक्रिया या घटकांवर विशेष भर होता. पुणे ग्रामीण पोलिस दलाने विविध डिजिटल प्रणालींची प्रभावी अंमलबजावणी केली. सीसीटीएनएस प्रणालीद्वारे एफआयआर नोंदणी, गुन्ह्यांची माहिती, तपास प्रगती आणि आरोपींची माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाली. यामुळे सर्व पोलिस ठाण्यांमध्ये रिअल-टाइम डेटा शेअरिंग सुलभ झाले आहे. 'आपले सरकार' पोर्टल अंतर्गत पुणे ग्रामीण पोलिस दलाने नागरिकांसाठी १७ विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे नागरिकांना घरबसल्या अर्ज करणे, प्रमाणपत्रे मिळवणे आणि विविध सेवा सहजपणे घेणे शक्य झाले. 'आपले सरकार ग्रीव्हन्स' प्रणालीद्वारे प्राप्त तक्रारी व अर्जांचा १४ दिवसांच्या आत निपटारा केला जात आहे. ई-ऑफिस प्रणालीमुळे कागदविरहित प्रशासनाला गती मिळाली. सर्वाधिक प्रकरणांचा जलद निपटारा करण्यात पुणे ग्रामीण पोलिस दल अग्रस्थानी राहिले. यामुळे कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमता वाढली आहे. व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणालीद्वारे नागरिकांना २४x७ तत्काळ माहिती, तक्रार नोंदणीची सुविधा आणि सेवा स्थिती तपासण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यामुळे संवाद अधिक जलद व सुलभ झाला. इंटिग्रेटेड डॅशबोर्ड आणि अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून पुणे ग्रामीण पोलिस दलाची संपूर्ण माहिती, कामगिरी, गुन्हेगारी आकडेवारी आणि विविध सेवा नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे पारदर्शकता अधिक बळकट झाली आहे. जीआयएस प्रणालीअंतर्गत रात्रगस्त दरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अचूक लोकेशन ट्रॅक करणे शक्य झाले आहे. यामुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत जवळचे पोलिस ठाणे सहज ओळखता येते आणि तात्काळ मदत मिळते. डायल ११२ आपत्कालीन सेवा अंतर्गतही उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली आहे. कमी वेळेत नागरिकांना प्रतिसाद देण्यावर विशेष भर दिल्याने आपत्कालीन सेवांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या “पोलिस पॅड” प्रणालीद्वारे ४ ते १० हजार लोकसंख्या असलेल्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अचूक मनुष्यबळ नियोजन करण्यात आले. या प्रणालीमुळे योग्य ठिकाणी योग्य पोलिस कर्मचारी तैनात करणे शक्य झाले असून, भीमा-कोरेगाव तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यांसारखे मोठे बंदोबस्त अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले.संदीप सिंह गिल, पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली “६० Days” आणि “९० Days” पायलट प्रकल्प राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा, सेवा वितरणातील गती आणि अंतर्गत समन्वय सुधारण्यात महत्त्वाची प्रगती झाली आहे. पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम पोलिस प्रशासन उभारणे ही काळाची गरज असून, पुणे ग्रामीण पोलिस दल या दिशेने सातत्याने प्रयत्नशील राहील. ही कामगिरी संपूर्ण पुणे ग्रामीण पोलिस दलासाठी अभिमानास्पद असून, राज्यातील इतर पोलिस दलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे,असेही गिल म्हणाले.
किल्ले रायगड येथे १ आणि २ एप्रिल २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची ३४६ वी पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आणि दुर्गसंवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९५ साली स्थापन केलेल्या या मंडळाने १९२५-२६ मध्ये रायगडावरील शिवछत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार केला होता. त्या कार्याला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असल्याने, ही परिषद विशेष महत्त्वाची ठरली आहे. या कार्यक्रमासाठी राज्यसभेचे खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक आनंद पाळंदे यांना 'श्रीशिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. तसेच, नागपूरकर भोसले घराण्याचे वंशज श्रीमंत मुधोजीराजे भोसले आणि निवृत्त ब्रिगेडीयर संग्राम मोहिते यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. शाहीर विक्रम अवचिते यांचा शाहिरी कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. शिवपुण्यतिथीच्या आदल्या दिवशी दुर्गसंवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत प्रा. प्र. के. घाणेकर, डॉ. सचिन जोशी आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांची सत्रे व मार्गदर्शन होणार आहे. मान्यवरांच्या मुलाखतींचाही यात समावेश करण्यात आला असल्याचे आयोजक यांनी सांगितले आहे. कार्यक्रमासाठी रायगडावर न्याहरी, भोजन, निवास, स्वच्छतागृहे आणि महिलांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन करावे, असे आवाहन मंडळाचे पदाधिकारी पांडुरंग बलकवडे आणि सुधीर थोरात यांनी केले आहे.
पुणे जिल्हा परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या मूल्यमापनात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. परिषदेला २०० पैकी १९६.२५ गुण मिळाले आहेत. तसेच, 'सेवाकर्मी' कार्यक्रमातही जिल्हा परिषदेची प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. या यशाबद्दल मुंबईतील सह्याद्री सभागृहात आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यात आले होते. यामध्ये कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर तसेच भौगोलिक माहिती प्रणाली या सात महत्त्वाच्या घटकांवरील कामगिरी विचारात घेण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेने डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात अनेक अभिनव उपक्रम राबवले आहेत. यामुळे नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा उपलब्ध झाल्या आहेत. इंटिग्रेटेड वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम, 'स्पंदन', ई-लॉटरी, सिस्टिम ऑफ पेन्शन इलस्ट्रेशन आणि क्यूआर कोड आधारित कर संकलन प्रणाली यांसारख्या नाविन्यपूर्ण प्रणाली जिल्हा परिषदेने विकसित केल्या आहेत. परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ द्विभाषिक, सुरक्षित आणि सुलभ असून, नागरिकांना सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळतात. 'आपले सरकार' प्रणालीत १०० टक्के सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ई-ऑफिस प्रणालीमुळे कागदविरहित प्रशासनाला गती मिळाली असून, हजारो नस्ती जलद निकाली काढण्यात आल्या आहेत. तसेच, इंटिग्रेटेड स्मार्ट डॅशबोर्डद्वारे डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया सक्षम झाली आहे. 'पुणे झेडपी संवाद' या व्हॉट्सअॅप एआय चॅटबॉटद्वारे नागरिकांना २४x७ माहिती व सेवा मिळत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ब्लॉकचेन आणि जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करून मालमत्ता व्यवस्थापन, आरोग्य सेवा आणि विकास नियोजन अधिक प्रभावी करण्यात आले आहे. या यशाबद्दल बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, 'डिजिटल प्रशासन ही काळाची गरज आहे. पुणे जिल्हा परिषद नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनासाठी सतत प्रयत्नशील राहील आणि राज्यातच नव्हे तर देशातही एक आदर्श मॉडेल म्हणून उभी राहील.' पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले, 'पुणे जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा सन्मान केवळ गुणांचा नाही, तर नागरिककेंद्रित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशासनाच्या आपल्या वचनबद्धतेचा गौरव आहे. भविष्यातही नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध राहील.'
कन्नड संघाच्या डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलमध्ये सुरेश कलमाडी स्पोर्ट्स सेंटर आणि नव्याने विकसित क्रीडा मैदानाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या गणेशनगर येथील शाळेत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुरेश कलमाडी यांच्या पत्नी मीरा कलमाडी, कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे, सचिव मालती कलमाडी, उपाध्यक्ष इंदिरा सालियन, डॉ. नारायण हेगडे, अद्विक फाउंडेशनचे आदित्य भारतीय आणि पायल कलमाडी-भारतीय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरेश कलमाडी यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी हे स्पोर्ट्स सेंटर सुरू करण्यात आले आहे. पुणे शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात ओळख मिळवून देण्यात कलमाडी यांचे मोठे योगदान होते. यामध्ये पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन, महाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा नगरीची निर्मिती आणि २००८ च्या कॉमनवेल्थ युथ गेम्सचे यजमानपद मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या सेंटरमध्ये दोन अत्याधुनिक बास्केटबॉल कोर्ट तयार करण्यात आले आहेत. डॉ. कलमाडी शामराव शाळेतील या क्रीडा मैदानासाठी अद्विक फाउंडेशनने ६५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. सुरेश कलमाडी यांचे वडील डॉ. शामराव कलमाडी यांनी पुण्यात स्थायिक झालेल्या कन्नड कुटुंबातील मुलांना मातृभाषेत शिक्षण मिळावे या उद्देशाने कन्नड संघाची स्थापना केली होती. यावेळी बोलताना मीरा कलमाडी यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार राहिलेल्या सुरेश कलमाडी यांना खेळाची खूप आवड होती. त्यांनी पुण्यात प्रथम मॅरेथॉन स्पर्धा सुरू केली, ज्यात सुरुवातीला ३०० जणांनी सहभाग घेतला होता. कालांतराने या स्पर्धेची लोकप्रियता वाढली आणि खेळाडूंची संख्या तीन लाखांपर्यंत पोहोचली. मुलांनी खेळात सहभागी होऊन देशाचे नाव मोठे करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मालती कलमाडी म्हणाल्या, मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे हा संस्थेचा उद्देश आहे. खेळाच्या माध्यमातून मुलांना मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते. ही सुविधा एक पायलट प्रोजेक्ट असून, कालांतराने संस्थेच्या इतर शाळांमध्येही त्याचा विस्तार करण्यात येईल. मुलांमधील क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अद्विक फाउंडेशनचे आदित्य भारतीय यांनी स्पष्ट केले की, भारतामध्ये क्रीडा संस्कृती वाढविण्यात सुरेश कलमाडी यांचे मोठे योगदान राहिले आहे. खेळामुळे करिअरला आकार मिळण्यास मदत होते आणि खेळात एक वेगळी ताकद असते.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) द्वारे आयोजित 'नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज हॅकॅथॉन २०२६' स्पर्धेत पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (PCCoE) च्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विजयाबद्दल त्यांना पाच लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले. ही स्पर्धा आयआयटी हैदराबाद येथे पार पडली. या विजयी संघात तृतीय वर्षाचे विद्यार्थी अभिषेक निकम, तृप्ती सुकाळे, कोसदा भट आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी हर्षिल बियाणी व अंश दुधे यांचा समावेश होता. पीसीसीओईचे संचालक व प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. अनुराधा ठाकरे आणि सह प्राध्यापक डॉ. सांत्वना गुडधे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 'अॅक्सिलरेटिंग हेल्थ क्लेम्स जर्नी' या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा आयआयटी हैदराबाद, एनआरसीइएस, जनरल इन्शुरन्स कौन्सिल, गुगल, इंडिया इन्सुरटेक असोसिएशन आणि एनएचसीएक्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. देशभरातील नवोन्मेषक, स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून भारताच्या आरोग्यसेवा डिजिटल क्षेत्रात बळकटी देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. पीसीसीओईच्या कॉम्प्युटर एआय एमएल विभागातील विद्यार्थ्यांनी 'प्रोब्लेम सॉल्व्हिंग ३' या विभागात देशभरातील अनेक प्रतिभावान स्टार्टअप्सना मागे टाकत हा विजय मिळवला. त्यांनी 'क्लेमसिंक एआय' नावाचा एक नाविन्यपूर्ण उपाय विकसित केला. हा प्लॅटफॉर्म जटिल आणि असंरचित आरोग्य विमा कागदपत्रांना संरचित, इंटरऑपरेबल डिजिटल डेटामध्ये रूपांतरित करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे आणि प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकणे हा एक समृद्ध अनुभव असल्याचे पीसीसीओईचे संचालक व प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते रामटेकडी परिसरात नवीन पोलिस चौकीचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. नागरिकांच्या मागणीनुसार, बांधकाम व्यावसायिक नाईकनवरे कुटुंबियांच्या वतीने ही चौकी उभारण्यात येत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या चौकीचे उद्घाटन होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमाला हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, झोन पाचच्या पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके, स्थानिक नगरसेविका हेमलता मगर, हेमंत नाईकनवरे, रणजित नाईकनवरे, गौरी नाईकनवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, गेल्या वर्षी पुण्यातील १२ नवीन पोलिस ठाण्यांना राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. राज्यात सर्वाधिक १८०० नवीन पोलिस कर्मचाऱ्यांची भरती पुणे शहरात होत आहे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नवीन पोलिस ठाण्यांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल. अमितेश कुमार यांनी रामटेकडी परिसरातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या तीस हजार नागरिकांच्या सुरक्षेवर भर दिला. त्यांनी अधिकाऱ्यांना या भागाचे मॅपिंग करून अवैध धंदे करणारे आणि १० वर्षांखालील गुन्हेगार यांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले. अशा व्यक्तींना सुधारण्याची संधी द्यावी, मात्र सुधारणा न झाल्यास त्यांची परेड काढण्याच्या कडक सूचनाही त्यांनी दिल्या. ऑक्टोबरमध्ये रामटेकडी भागात घडलेल्या एका घटनेनंतर नागरिकांचे शिष्टमंडळ आपल्याला भेटले होते, असे कुमार यांनी सांगितले. त्यावेळी अवघ्या २४ तासांत कंटेनरमध्ये तात्पुरती पोलिस चौकी सुरू करण्यात आली होती. रामटेकडी परिसरातून गुन्हेगारी हद्दपार करून 'रामराज्य' आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपला प्रभाग ड्रग्ज आणि अवैध धंदेमुक्त करण्यासाठी योजना सुरू करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. आमदार चेतन तुपे यांनी सांगितले की, नवीन तीन मजली पोलिस चौकीमुळे रामटेकडी भागाची सुरक्षा वाढेल. त्यांनी क्रेडाईसारख्या संस्थांनी पुढाकार घेऊन रामटेकडी येथील महापालिकेच्या शाळेचे नूतनीकरण करण्याची गरज व्यक्त केली. नाईकनवरे कुटुंबियांच्या वतीने हेमंत नाईकनवरे यांनी सांगितले की, राज्य सरकारने झोपडपट्टी पुनर्वसनासाठी उत्तम नियमावली तयार केली आहे. या भागात चांगले रुग्णालय उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच, परिसरातील नागरिकांसाठी मल्टिप्लेक्स, फिरण्यासाठी उत्तम सुविधा आणि मुलांसाठी मोफत क्लासेस व चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यावरही ते विचार करत आहेत.
पुण्यात सायबर गुन्हेगारांनी एका व्यावसायिकाला ऑनलाइन स्टील खरेदीच्या बहाण्याने ४.५४ कोटी रुपयांची फसवणूक केली. मात्र, व्यावसायिकाने वेळीच सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने आणि पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे व्यावसायिकाचे पैसे परत मिळवण्यात यश आले आहे. सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका ५० वर्षीय व्यावसायिकाला बांधकामासाठी स्टीलची आवश्यकता होती. त्यांनी ऑनलाइन स्टील खरेदीसाठी विविध वेबसाइट्स आणि जाहिराती तपासल्या. काही वेळाने त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने आपण राजस्थानहून बोलत असल्याचे सांगून आवश्यक स्टील उपलब्ध असल्याचे सांगितले. मात्र, त्यासाठी प्रथम पैसे द्यावे लागतील आणि त्यानंतरच माल पोहोचवला जाईल, अशी अट घातली. त्यानुसार, एका मध्यस्थाने व्यावसायिकाला दोन बँक खात्यांचे क्रमांक पाठवले. पहिल्यांदा २ कोटी २७ लाख रुपये एका बँक खात्यात, तर दुसऱ्यांदा २ कोटी २७ लाख रुपये दुसऱ्या बँक खात्यात जमा करण्यात आले. अशा प्रकारे एकूण ४ कोटी ५४ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला. पैसे भरल्यानंतर व्यावसायिकांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींचा फोन क्रमांक बंद आला. पैसे पाठवल्यानंतर अवघ्या चार तासांत फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. रात्रीची वेळ असल्याने त्यांनी तातडीने ऑनलाइन सायबर तक्रार नोंदवली. पोलिसांनी ही तक्रार पाहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी संबंधित दोन्ही बँक खातेधारकांशी संपर्क साधला आणि बँकांना पैसे जप्त करण्याचे निर्देश दिले. खातेधारकांनाही त्यांच्या खात्यात हे पैसे कुठून आले, याची माहिती नव्हती. पोलिसांनी संबंधित खातेधारकांना व्यावसायिकाच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे पैसे परत पाठवण्यास सांगितले, त्यामुळे व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान टळले.

31 C