उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी केवळ भावनिक नाही, तर ती सत्तासमीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये आधीपासून सुरू असलेल्या मतभेदांना या घटनेमुळे नवे वळण मिळाले आहे. विलीनीकरणाच्या कथित चर्चेमुळे राज्याचे राजकीय वातावरण अधिकच गूढ बनले आहे. अजित पवारांच्या इच्छेविषयी स्पष्ट माहिती नसल्याने या प्रकरणी सध्या केवळ तर्कवितर्कांचेच राज्य आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्णायक व व्यवहारकुशल नेते होते. 2023 मध्ये त्यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्याच्या सत्तासमीकरणांत मोठा बदल झाला. मात्र त्यांच्या निधनानंतर पक्षाच्या भविष्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का? हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. शरद पवार गटाने केलेला दावा या वादाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, विलीनीकरणाच्या संदर्भात अजित पवारांसोबत उच्च पातळीवर चर्चा सुरू होती. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ही चर्चा खरोखरच सुरू होती, तर ती किती पुढे गेली होती आणि अजित पवारांच्या त्यासंबंधीची भूमिका काय होती? हा प्रश्न या प्रकरणी उपस्थित झाला आहे. मात्र दुसरीकडे अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांनी हा दावा ठामपणे फेटाळला आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय अंतिम होता आणि सध्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नव्हती. गुप्त चर्चांची शक्यता नाकारता येत नाही या परस्परविरोधी दाव्यांमुळे राजकीय वातावरण अधिकच गोंधळलेले दिसते. एका बाजूला शरद पवार गटाचा दावा आहे की, चर्चा 'बंद दरवाज्याआड' झाली होती आणि त्यात मर्यादित नेते सहभागी होते. दुसरीकडे अजित पवार गटातील नेते या चर्चेचा पूर्णपणे इन्कार करत आहेत. यामुळे सत्य नेमके काय? हा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच पडद्यामागील घडामोडींना महत्त्व राहिले आहे. त्यामुळे अशा गुप्त चर्चांची शक्यता नाकारता येत नाही, पण ठोस पुरावे समोर येत नसल्याने वाद अधिकच वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने वाद तापला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार गटाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने हा वाद आणखी तापला. त्यावर शरद पवारांनी दिलेले प्रत्युत्तर हे केवळ राजकीय प्रतिक्रिया नसून, राष्ट्रवादीच्या अंतर्गत मतभेदांचे संकेत देणारे होते. त्यांनी फडणवीस व काही अन्य नेते या चर्चेबाहेर होते असे सांगून राजकीय समीकरणातील रेषा अधिक स्पष्ट केल्या. यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी गटांमधील तणावही वाढल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेतृत्व कुणाकडे? हाच मोठा मुद्दा अजित पवारांच्या निधनानंतर सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे नेतृत्वाचा. त्यांच्या जागी कोण पुढे येणार, हा मुद्दा पक्षासाठी अत्यंत संवेदनशील ठरला आहे. सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ही या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घटना मानली जात आहे. मात्र या शपथविधीबाबत शरद पवारांनी व्यक्त केलेले अनभिज्ञतेचे वक्तव्य कुटुंब आणि पक्षातील मतभेद अधोरेखित करणारे ठरले. राजकारणात कुटुंबीयांची भूमिका अनेकदा निर्णायक असते आणि राष्ट्रवादी काँग्रेसही त्याला अपवाद नाही. त्यामुळे या निवडीमुळे पुढील काळात पक्षातील अंतर्गत समीकरणे कशी बदलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पार्थ पवारांना घाई न करण्याचा सल्ला पार्थ पवार यांच्या राज्यसभेच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा हा या वादाचा आणखी एक पैलू आहे. भाजपने कथितपणे घाई न करण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेमुळे सत्ताधारी आघाडीतही सावध भूमिका घेतली जात असल्याचे दिसते. राज्यसभेची रिक्त झालेली जागा आणि त्यावर कुणाला संधी दिली जाते, यावरूनही पक्षातील ताकद आणि प्रभावाचे गणित स्पष्ट होणार आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठी कमतरता जाणवते ती म्हणजे स्पष्ट नेतृत्वाची. अजित पवार हे व्यवहारकुशल आणि संघटनात्मक दृष्ट्या मजबूत नेते होते. त्यांच्या अनुपस्थितीत पक्षातील विविध गटांचे संतुलन राखणे ही मोठी कसोटी ठरणार आहे. विलीनीकरणाच्या चर्चेची सत्यता काहीही असो, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसपुढे सर्वात मोठे आव्हान हे आपली राजकीय दिशा निश्चित करण्याचे व कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे आहे. राष्ट्रवादीची राज्याच्या राजकारणात निर्णायक भूमिका राजकीय विश्लेषकांच्या मते, या वादामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना दीर्घकालीन रणनीती ठरवावी लागणार आहे. एकत्र येण्याचा पर्याय निवडायचा की स्वतंत्र मार्गाने पुढे जायचे, यावर पक्षाचे भविष्य अवलंबून असेल. विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीची नेहमीच निर्णायक भूमिका बजावत आली आहे. त्यामुळे या पक्षाच्या अंतर्गत घडामोडींवर राज्यातील इतर पक्षांचेही बारकाईने लक्ष आहे. अखेरीस अजित पवारांच्या इच्छेबाबत स्पष्ट माहिती समोर येईपर्यंत विलीनीकरणाची मिस्ट्री कायम राहण्याची शक्यता आहे. राजकीय वक्तव्ये आणि प्रतिवाद यामुळे वातावरण अधिकच धूसर झाले आहे. पुढील काही आठवडे किंवा महिने राष्ट्रवादीसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. या काळात घेतले जाणारे निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाचे नवे चित्र ठरवू शकतात. तूर्त अनिश्चिततेच्या या काळात राष्ट्रवादीला स्थैर्य देणारे नेतृत्व व स्पष्ट भूमिका याच गोष्टींची सर्वात मोठी गरज आहे.
सुनेत्रा पवार यांचा शपथविधीला इतकी का घाई का झाली त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. तसेच विलीनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार पूर्ण होण्यापूर्वी का सुरू करण्यात आली. का सतत मुलाखतीला फेरा सुरू ठेवण्यात आला? विलीनीकरणाचा आणि उपमुख्यमंत्रीपदाचा कसा संबंध येतो हे जर मला सांगितले तर मी माझी भूमिका मांडेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सुनील तटकरे म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण असा काही मुद्दाच नव्हता. आमचा पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष आहे, म्हणजे भाजपचा मित्रपक्ष आहे. आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा सरकारमध्ये मंत्रिपदे आम्हाला देण्यात आली आम्ही एकत्रित लोकसभेची निवडणूक लढवली, आणि आताही सत्तेत सोबत आहोत त्यामुळे आमच्या विलीनीकरणाबद्दल भाजपसोबत चर्चा करणे गरजेचे आहे. 2019 मध्ये मविआ स्थापन करत असताना सोनिया गांधींची परवानगी मागण्यात आलीच ना? कारण तो युपीएमधील महत्त्वाचा पक्ष आहे. युती-आघाडी करत असताना महत्त्वाच्या पक्षासोबत चर्चा करावी लागत असते. जनता, आमदारांच्या भावनेतून सुनेत्रा पवारांची निवड सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ नेता निवडतांना जनतेची आणि आमदारांची भावना लक्षात घेत आम्ही सुनेत्रा पवार यांची निवड केली आहे. त्यावर आशावेळी प्रश्न चिन्ह निर्माण करणे योग्य नाही. अजित पवार यांनी गेल्या 3 वर्षांत जो प्रचंड जनसंपर्क तयार केला त्यामुळे विधानसभेला जनतेने आम्हाला मोठी साथ दिली. आम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेतला आहे, कुणाला काहीही वाटो, असे तटकरे यांनी सुनेत्रा पवारांच्या निवडीबद्दल बोलताना म्हटले आहे. कोणता पक्ष विलीन करणार? सुनील तटकरे म्हणाले की, विलीनीकरण कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात होणार? असा सवाल मी गेले 2 ते 3 दिवस विचारतो आहे, पण त्यावर दुर्दैवाने कोणी काहीच बोलत नाही, त्यांचे कारण मला काही कळू शकलेले नाही. ही चर्चा कोण सुरू करणार हा प्रश्न आहे. गेली 8 ते 10 महिने मी म्हणतोय की आम्ही एनडीएमध्ये आहोत जे भाजपसोबत येण्यासाठी अनुकुल आहेत तेच या चर्चा करू शकतात, नाही तर चर्चा करण्याचे काही प्रश्नच नाही. माझा विलीनीकरणाला विरोध आहे की नाही हा मुद्दा काही महत्त्वाचा नाही. अजित पवार यांचा विश्वासू सहकारी म्हणून गेली 40 वर्षे मी काम करत आलो आहे. त्यामुळे माझ्यावर अनेक वेळा आक्षेप घेतले गेले आहेत. अजित पवारांचा निर्णय असता तर माझा त्याला विरोध असण्याचा काही मुद्दाच नव्हता. मी नेहमी अजित पवारांचे निर्णय मान्य केला आहे. योग्यवेळी राष्ट्रीय अध्यक्षांची निवड सुनील तटकरे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाला ती माहिती अजित पवारांनी दिली होती. जिल्हा परिषद निवडणूक ही घड्याळीच्या चिन्हावर लढण्याचे ठरले होते त्यासंदर्भात आमचे बोलणे झाले. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. विधीमंडळ पक्षनेता निवडणे गरजेचे होते. योग्यवेळी कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन आम्ही पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करू. 2019 मध्ये अजित पवारांची इच्छा होती की भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार व्हावे त्यावेळी त्यांच्या इच्छेकडे कोणी लक्ष दिले नाही.
राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना मोठा दिलासा देणारी माहिती महिला व बालविकास विभागाकडून समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे थकीत राहिलेले तीन महिन्यांचे हप्ते आता एकत्रित स्वरूपात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा एकूण 4500 रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने त्रस्त झालेल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम मानला जातो. निवडणुकीत या योजनेचा महायुती सरकारला राजकीय लाभ झाल्याचेही चित्र दिसून आले. मात्र, ई-केवायसी प्रक्रियेमुळे अनेक लाभार्थींना नियोजित वेळेत हप्ते मिळाले नाहीत, त्यामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले होते. काही महिलांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. त्यामुळे महिलांनी संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी तर लाभार्थी महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करतानाही दिसून आल्या. पैसे का येत नाहीत, याबाबत स्पष्टता नसल्याने महिलांमध्ये संभ्रम आणि असंतोष वाढत होता. या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. नियम आणि अटी डावलून सादर झालेल्या अर्जांची पडताळणी सध्या सुरू आहे. यामुळे लाभार्थींची माहिती तपासून योग्य पात्र महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. या सर्व प्रक्रियेनंतर आता थकीत हप्ते एकत्र देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानुसार पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट 4500 रुपये जमा केले जाणार आहेत. ज्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते थकले होते, त्यांना जानेवारीसह एकत्रित रक्कम दिली जाईल. तर काही महिलांना यापूर्वीच दोन महिन्यांचे हप्ते मिळाले असल्यास, त्यांना जानेवारी महिन्याचा एकच हप्ता देण्यात येणार आहे. या संदर्भातील वृत्त एका मराठी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे. या निर्णयामुळे लाभार्थी महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने निर्माण झालेला तणाव कमी होणार असून, महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आर्थिक मदत वेळेत मिळणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रशासन आणि लाभार्थी यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मासिक हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची शक्यता दरम्यान, निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार भविष्यात या योजनेतील मासिक हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी यासंदर्भात संकेत दिले होते. हा निर्णय प्रत्यक्षात आल्यास राज्यातील लाखो महिलांना अधिक आर्थिक आधार मिळेल आणि लाडकी बहीण योजना अधिक प्रभावी ठरेल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अपहरण, फसवणूक आणि रागातून घर सोडलेल्या मुला-मुलींच्या शोधार्थ पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान १४’ मोहीम सुरू केली आहे. हरवलेली मुले शोधून त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्याकरिता पोलिसांकडून ही मोहीम व्यापक स्वरूपात राबवली जात आहे. यासाठी शहर पोलिस आयुक्तलयातील १३ पोलिस ठाण्यांत विशेष पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. ही मानवतावादी मोहीम असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगीतले. पोलिस ठाण्यात दाखल अपहरण, बेपत्ता बालकांचा शोध घेण्याकरिता ही विशेष मोहीम सुरू केली आहे. अपर पोलिस महासंचालक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, स्वयंसेवी संस्था आणि सायबर पथक यांच्या संयुक्त प्रयत्नाने रेल्वे व बस स्थानक, धार्मिक स्थळ, औद्योगिक परिसर, रुग्णालये, हॉटेल्स व शहरातील संवेदनशील भागात विशेष शोधमोहीम राबवली जाणार आहे. तुटलेल्या कुटुंबियांना मिळणार दिलासा मुलं बेपत्ता झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब तुटून पडते. या कुटुंबांना पुन्हा जोडण्याकरता मानवतावादी मोहीम शहर पोलिसांनी सुरू केली आहे. १३ पोलिस ठाणेनिहाय स्वतंत्र पथक स्थापन केले असून उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी नियुक्त केला आहे. हरवलेल्या प्रत्येक मुलाला सुरक्षित घरी पोहोचवण्याचा निर्धार पोलिस यंत्रणेने व्यक्त केला आहे. पोलिस ठाणेनिहाय मिसिंग सेल सुरू नाशिक पोलिस आयुक्तालयातील १३ पोलिस ठाण्यात स्वतंत्र मिसिंग सेल स्थापन करण्यात आले आहे. विभागीय स्तरावरील नोडल अधिकारी नियुक्त केले आहे. ते असे : पंचवटी : सहायक आयुक्त शेखर देशमुख, सरकारवाडा: सुधाकर सुरवाडकर, अंबड: सचिन बारी, नाशिकरोड : संगीता निकम.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढून तब्बल 1 लाख 1 हजार कोटींवर पोहोचला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्यात काही बदल केला आहे. या बदलामुळे हा खर्च वाढल्याचा दावा केला जात आहे. शक्तिपीठ महामार्गाद्वारे राज्यातील साडेतीन शक्तिपीठांना जोडण्यात येणार आहे. पण कोल्हापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्यात काही बदल करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) भूसंपादनाला विरोध करणाऱ्या कागल व हातकणंगले तालुक्याचा एक मोठा भाग या महामार्गातून वगळला. याशिवाय नांदेड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व धाराशिव जिल्ह्यातही काही बदल करण्यात आले. प्रकल्पाच्या आरखड्यात सातारा जिल्हाही नव्याने जोडण्यात आला. यामुळे हा महामार्ग आता 12 ऐवजी 13 जिल्ह्यांतून जाणार आहे. परिणामी, या प्रकल्पाच्या खर्चात 15 हजार कोटींची वाढ झाली आहे. यामुळे या प्रकल्पाचा खर्च 86 हजार कोटींवरून 1 लाख 1 हजार कोटींवर पोहोचला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रस्तावाची तपासणी करत आहेत. हा महामार्ग समृद्धी महामार्गासारखाच प्रवेश नियंत्रित शीघ्र संचार महामार्गात येतो. त्यामुळे या महामार्गावरून वेगवान प्रवास शक्य असल्यामुळे वेळेची अधिकाधिक बचत होण्यास मदत होणार आहे. शक्तिपीठ महामार्गात कोणता बदल झाला? शक्तिपीठ महामार्ग करवीर, भुदरगड, आजरा, चंदगड मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याला जोडला जाईल. नव्या आराखड्यानुसार, हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यांतील जाणार आहे. महामार्गाच्या नव्या आखणीत सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हा महामार्ग आता 350 गावांऐवजी आता 395 गावांतून जाणार आहे. त्यामुळे या महामार्गासाठी 8 हजार 500 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. आधीच्या आराखड्यानुसार 802 किमीचा असलेला हा महामार्ग आता 856 किमीचा होणार आहे. प्रकल्पाच्या भूसंपादनाचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे. यासाठी सरकार कर्ज घेणार आहे. आतापर्यंत 196 गावांमधील भूसंपादनाची मोजणी पूर्ण झाली आहे.
आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय... छक्के-पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात रहावं का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राजकारणात राहवे का? असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नसल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत शहरात घडलेल्या एका घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मरणार्थ नागरिकांनी लावलेले श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीकडून हटवण्यात आल्याची माहिती समोर येताच संतापाची लाट उसळली. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यभरातून भावनिक प्रतिक्रिया उमटत असताना कर्जतमधील ही घटना विशेष चर्चेत आली आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने उभारलेले श्रद्धांजलीचे बॅनर हटवण्यामागचे कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला होता. 29 जानेवारी रोजी बारामतीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये, गावांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बॅनर, पोस्टर आणि फ्लेक्स लावले होते. कर्जत शहरातही अशाच प्रकारे भावनिक वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. मात्र नगरपंचायतीकडून हे फ्लेक्स हटवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त करत ही कृती अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, ही घटना केवळ अजित पवारांचा अवमान करणारी नाही, तर नागरिकांच्या भावनांनाही धक्का देणारी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी स्पष्ट शब्दांत केली. रोहित पवारांच्या या प्रतिक्रियेमुळे प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. श्रद्धांजलीचे फ्लेक्स काढण्यामागे प्रशासनाचे नेमके कारण काय, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही नागरिकांनीही यावर नाराजी व्यक्त केली असून, श्रद्धांजलीसारख्या भावनिक बाबतीत प्रशासनाने संवेदनशीलता दाखवायला हवी होती, अशी भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे कर्जतमधील या निर्णयावरून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या संगमावर करण्यात आले. बारामतीहून अस्थिकलश सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. या ठिकाणी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी गर्दी करून अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर विधीपूर्वक अस्थींचे विसर्जन करण्यात आले. फ्लेक्स हटवण्याच्या घटनेने वाद या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी अजित पवार यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली वाहिली. सांगलीतील या कार्यक्रमानेही अजित पवारांविषयी असलेली जनभावना स्पष्ट झाली. राज्यभरात विविध ठिकाणी श्रद्धांजलीचे कार्यक्रम पार पडत असताना कर्जतमधील फ्लेक्स हटवण्याच्या घटनेने मात्र वेगळाच वाद निर्माण केला आहे.
जळगाव जिल्ह्यात पक्षांतरं होतील आणि त्यामुळे सार्वजनिक शांतता धोक्यात येणार आहे, याचा सुगावा जिल्ह्याच्या पोलिस यंत्रणेला लागला आहे. त्यामुळे 14 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. येणाऱ्या जिल्हा परिषदनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पक्षांतरे होतील, अशी शक्यता पोलिस प्रशासनाला वाटते आहे.जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेची निवडणूक कधी होणार आहे, याचा अंदाज अजून निवडणूक आयोगालाही आला नसेल; पण जिल्हा पोलिस यंत्रणेने तो अंदाज घेतला आहे, हे आश्चर्याचे मानले जाते आहे. पोलिस प्रशासनाने दिलेल्या या अहवालाप्रमाणे जिल्हा दंडाधिकारी कार्यालयानेही तीच‘री’ ओढत तातडीने जमावबंदी आदेश लागू केले आहेत. मुंबई पोलिस अधिनियमातील कलम 37(1) आणि (3) अन्वये हे आदेश जारी करण्यात आले असून 14 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंतते लागू राहाणार आहेत. त्यानुसारया काळात लग्न कार्य, धार्मिक कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम किंवा अंत्ययात्रा वगळता पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी हे आदेश जारी केले आहेत. दरम्यान,आदेश काढला त्या दिवसापासून त्याची अंमलबजावणी केली जाते आहे. आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षताही घेतली जाते आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यातील पक्षांतराची शक्यता अधिक चर्चेची ठरू पाहते आहे. विशेष असे कारण नाही दर 15 दिवसांनी अशा प्रकारचाआदेश पोलिसांतर्फे काढला जातो आहे. त्यात राजकीय हालचाली आणि पक्षांतर या शब्दांचे विशेष असे काही कारण नाही. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस अधीक्षक
अहिल्यानगर शहराजवळून जाणारा नाशिक-सोलापूर-अक्कलकोट हा 6 पदरी ग्रीन “फील्ड’ कर्नाटक मार्गे चेन्नईला जाणार आहे. महाराष्ट्रातील नाशिक ते अहिल्यानगर व अहिल्यानगर ते सोलापूर अशा दोन टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक ते अहिल्यानगर हे काम पूर्ण होणार आहे. 2023 पासून हा प्रकल्प थांबवण्यात आला होता, आता मात्र केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिल्याने या ग्रीन फिल्डचा पुढचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात संगमनेर तालुक्यातील चौरकवठे येथून या ग्रीनफिल्डच्या कामाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी मार्च महिन्यात शेतकऱ्यांना मोबदला वाटप केला जाणार आहे. त्यासाठी महसूल प्रशासनाकडून सुरू झालेली भूसंपादनाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. नाशिक -चेन्नई (पूर्वीचे नाव सुरत- चेन्नई) हा ग्रीनफिल्ड’ अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अन्य चार तालुक्यांतून जाणार आहे. 140 किमीचे जिल्ह्यातील या ग्रीनफील्ड’चे अंतर आहे. 2023 मध्ये सुरत- चेन्नई जुने नाव असलेल्या या ग्रीन फील्ड साठी भूसंपादनाची प्रक्रियादेखील सुरू झाली होती. भारत माला योजनेतून हा प्रकल्पपूर्ण करण्यात येणार होता. मात्र भारतमाला योजनेला मुदतवाढ न मिळाल्याने हा प्रकल्प थांबला होता. त्यानंतर महिन्याभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने 19 हजार 142 कोटीच्या खर्चाच्या नाशिक-अक्कलकोट प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून लांबणीवर पडलेला हा प्रकल्प पुन्हा मार्गी लागला आहे. आहिल्यानगर जिल्ह्यात मार्च अखेरपर्यंत या प्रकल्पाचे भूसंपादन केले जाणार आहे. अंदाजे या प्रकल्पाची किंमत अहिल्यानगर जिल्ह्यातील 10 हजार कोटींची आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर -सोलापूर-अक्कलकोट या प्रवासाची सध्या असलेली 4 तासांची वेळ 2029 पासून 2 तासांवर येणार आहे. सध्या अक्कलकोटला जाण्यासाठी 4 तास लागतात. प्रवाशांबरोबरच शेतीमालाची वाहतूक होणार सुलभ केंद्र सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे नाशिक अहिल्यानगर व सोलापूर हे जिल्हे दक्षिण भारतातील चेन्नईसह अन्य जिल्ह्यांना जोडले जाणार आहे. हा सहा पदरी ग्रीनफील्ड असल्यामुळे या तीन जिल्ह्यातील शेतीमाल दक्षिण भारतात घेऊन जाणे सोपे होणार आहे. सध्या असलेल्या मार्गावर प्रवाशांचा जाणारा वेळ हाग्रीनफिल्ड पूर्ण झाल्यानंतर कमी होईल.विशेष करून हा ग्रीनफिल्ड नंतर समृद्धीला जोडला जाणार असल्यामुळे नागपूर व मुंबईहा प्रवास थेट होणार आहे. जमिनीचा 80 टक्के ताबा मिळाल्यानंतरच प्रकल्पाला सुरुवात नाशिक -अक्कलकोट ग्रीनफील्ड साठी महसूल विभागाकडून 80 जमिनीचा ताबा मिळाल्यानंतरच या प्रकल्पाला वेग येणार आहे.नाशिक, सोलापूर असे दोन झोन केंद्र सरकारने तयार केले असून, या दोन झोनमार्फतच शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर पुढच्या 3 महिन्यात प्रत्यक्षात या कामाला सुरुवात केली जाईल. -अमरीश मानकर, प्रभारी महाप्रबंधक,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अहिल्यानगर नाशिक-अक्कलकोट ग्रीन फील्डचे 90 टक्के भूसंपादन महसूल विभागाकडून 15 मार्चपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी काही अडचणीमुळे केंद्र सरकारने काही गावाच्या भूसंपादनाला स्थगिती दिली होती. तीन ते चार गावे वगळता उर्वरित गावातील जमिनीचे भूसंपादन करण्याचे काम सुरू आहे. या 3 ते 4 गावांच्या भूसंपादन प्रक्रियेला तीन महिन्याचा कालावधी लागेल. -डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी
जळगाव शहर देशातील तीन राज्यातील पाच शहरांशी विमानसेवेने जोडले गेले आहे. आता इंदुरसाठी एप्रिलपासून विमानसेवा सुरु होणार आहे. मात्र, ही सेवा व्यावसायिक तत्वावर असेल. जळगावहून इंदूर पोहचण्यासाठी सव्वाते दीड तासांचा वेळ लागेल. ‘फ्लाय 91’ कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर जळगाव-इंदूर विमानसेवा ‘लवकरच सुरु होत आहे’ असे जाहीर केले आहे. कंपनीकडे सध्या 6 एअरक्रॉफ्ट आहेत. कंपनीतर्फे आणखी 3 नवीन फ्रान्समधून 10 फेब्रुवारीपर्यंत येणार होते.ते आता 20 ते 25 तारखेच्या पुढे भारतात दाखल होतील. ते आल्यानंतर कंपनीतर्फे देशात पाच नवीन रुट सुरु करण्यात येणार आहे. त्यात हैदराबाद-जळगाव- इंदूर रूटचा समावेश आहे. उत्तर भारतासाठी सेवा द्या जळगाव शहर हे राज्याची आर्थिक राजधानी असलेले मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे यासह गोवा, अहमदाबाद (गुजरात),हैदराबाद (आंध्र प्रदेश) या तीन राज्यांशी विमान सेवेने जोडले गेले आहे. लवकरच इंदूर (मध्य प्रदेश)या चौथ्या राज्याशी जळगाव कनेक्ट होईल. त्यासोबत उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणाता वाढलेली आहे. दिल्ली, जयपूर या शहरांसाठी विमान सेवा सुरु करावी, अशी अपेक्षा ‘कॅट’ व्यापारी संघटनेचे राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी यांनी व्यक्त केली आहे. भोपाळमार्गे रेल्वेने सुमारे 8 तास जळगाव ते इंदूर शहराचे अंतर सुमारे 275 किलोमीटर आहे. त्यासाठी रेल्वेने भोपाळमार्गे गेल्यास 8 ते 10 तास, बसने 7 ते 8 तास तरकार किंवा टॅक्सीने 5 ते 6 तासांचा अवधी लागतो. त्या तुलनेत विमानाने अवघ्या सव्वा ते दीड तासात जळगावहून इंदूरला पोहचता येईल. ही सेवा व्यावसायिक झाल्यास किमान 2500 रुपयांवर एका सीटचे तिकीट राहू शकते. व्यावसायिक असेल विमानसेवा जळगावातून गोवा, पुणे, अहमदाबाद, मुंबई, हैदराबाद या पाच शहरात आरसीएसअंतर्गत (रिजनल कनेक्टीव्ही सर्व्हीस ) विमानसेवा सुरु आहे. नव्याने सुरु होणारी जळगाव-इंदूरसेवा मात्र व्यावसायिक तत्वावर असण्याची शक्यता कंपनीच्या सूत्रांकडून वर्तवली.
मॉरिशस हा एक छोटा भारतच आहे.आमचे पूर्वज भारताचे होते.मॉरिशसच्या प्रत्येक घराबाहेर तुळशी आणि घरात हनुमानाची मूर्ती आहे.आमच्या इथे एक गंगा तलाव नावाचे तीर्थक्षेत्र आहे. या तलावात भारतातून गंगेचे थोडे पाणी आणून टाकले असून तो तलावच आमच्यासाठी गंगा आहे. महाशिवरात्रीला त्या तलावातील पाणी आणून आम्ही घरातील शिव पिंडीवरअभिषेक करतो. तसेच होळी,दिवाळी, जन्माष्टमी, रामनवमी असे सर्व भारतीय उत्सव जल्लोषात साजरे करीत असल्याचे इस्कॉनचे आंतरराष्ट्रीय प्रचारक सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज यांनी सांगितले. ते इस्कॉनच्या प्रचारानिमित्ताने भारतात आले असून एका कार्यक्रमानिमित्त जळगावात आल्यानंतर ‘दिव्यमराठी’ने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. तो त्यांच्या शब्दात... साधूंनी आध्यात्मिक चर्चा करावी,लोकांप्रती दया भावना असावी.व्यापार, राजकारणात साधूने पडू नये.जेव्हा ते खऱ्या धर्मापासून परावृत्तहोतात तेव्हाच ते अशा मार्गाकडे वळतात. साधूंनी इतर साधूंचा संघ धरायला हवा, गुरू करायला हवे,शास्त्र वाचायला हवे सर्वांनी भगवंत सेवा हाच उद्देश ठेवायला हवा तरच त्यांच्यावर चुकीचे आरोप होणार नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य हे धर्माचे पालनही करतात आणि लोकांची काळजीपण करतात, असे देखील सुंदर चैतन्य गोस्वामी महाराजयांनी सांगितले. यामुळे श्रीकृष्णाची भक्ती 33 कोटी देव-देवता आहेत.यात प्रत्येक देव-देवता या वेगवेगळ्या समूहाचे प्रतिनिधित्व करतात. (इंद्र-पाणी, सरस्वती- विद्या,लक्ष्मी- संपत्ती) आम्ही सर्वच देवांचा आदर करतो; मात्र श्रीकृष्ण हे स्वयं भगवान आहे. आम्हीयासाठी देखील कृष्णाची भक्ती करतो की, कृष्णच भक्ती व मुक्ती देऊ शकतात. भगवान कृष्णांनी गीतेच्या 18 व्या अध्यायातील 66 व्या श्लोकात ‘तू सर्व धर्मांचा त्याग करून माझ्याकडे ये’असे सांगितले आहे म्हणून आम्ही कृष्णाकडे जातो. आपण देवतांकडे काही न मागता केवळ निर्मळ मनाने सेवा करावी. जीवनात सुख नसेल तर शांती कशी मिळेल. सध्या आपली तांत्रिक प्रगती झाली असली तरी मन:शांती नाही. मन:शांतीही मन:मंत्रापासून मिळेल. मंत्र म्हणजे भगवंताचे नामस्मरण ते करू तेव्हाच आपल्याला मन:शांती मिळेल. टेक्नॉलॉजीला आम्ही टाळू शकत नाही पण ते केवळ साधन आहे. यावर भगवंताचे नामस्मरण हाच उपाय आहे. असे सोडवा मुलांचे मोबाइलचे व्यसन टेक्नॉलॉजिला एक चांगली व दुसरी वाईट अशा दोनबाजू आहे. डॉक्टर व गृहिणींच्या हातात चाकू आला तरते शस्त्रक्रिया, भाजी कापण्यासाठी उपयोगात आणतील.तोच जर गुंडाच्या हातात गेला तर तो वाईट कृत्य करेल. सध्या मुले खूपच मोबाइलच्या आहारी गेली आहेत.त्यांना जर चांगल्या गोष्टीत गुंतवले तर ते मोबाइलचे व्यसन सहज सोडतील. तसेच एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणाऱ्याला जर आपण भगवद्भावना, भक्ती,नामस्मरण, नृत्य, कीर्तन, सेवा आणि ग्रंथ वाचनाकडे वळवले तर ते नक्कीच वाईट सवयी सोडून चांगल्या व्यक्ती बनतील असेही महाराज यांनी सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कडाडून टीका करत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण केला. अजित पवारांनी भाजपसोबत जाताना स्वतःचे विचार खुंटीला टांगले नाहीत; ते पक्ष चालवत होते, असे ठामपणे सांगत राऊतांनी पटेलांवर थेट निशाणा साधला. त्यांच्या मते, अजित पवारांचा पक्ष हा पवार कुटुंबाचा होता, तो कोणाच्याही छायेखाली चालणारा नव्हता. त्यामुळे पटेल यांनी अनावश्यक चिडचिड करू नये, असा टोला त्यांनी लगावला. याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करत प्रत्येक गोष्ट मोदी-फडणवीसांना सांगितलीच पाहिजे, हा हट्ट कशासाठी? असा सवाल उपस्थित केला. राऊतांनी उपरोधिक शैलीत विचारले, पटेलांना पवार कुटुंबाचा मुखिया केलं आहे का? त्यांच्या वक्तव्यातून प्रफुल पटेल यांच्याबाबतची नाराजी स्पष्ट दिसून आली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस चालवत होते, त्यामुळे भाजपची परवानगी घेण्याचा प्रश्नच नव्हता, असे ते म्हणाले. दोन पक्षांत चर्चा झाली, तर त्याची माहिती सर्वांना असलीच पाहिजे हा अनाठायी आग्रह का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पटेल हे मोदी-शाह यांचे भक्त असल्याचा आरोप करत, महाराष्ट्राला पटेल असंच करा, असा हल्लाबोल त्यांनी केला. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, त्यांचे एक पाय नव्हे, तर दोन्ही पाय भाजपत आहेत. या विधानाने त्यांनी राष्ट्रवादीतील काही नेत्यांवर भाजपच्या जवळीकतेचा आरोप केला. पुढे ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष अमित शाह यांनी स्थापन केला आहे, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड त्यांचे शेअरहोल्डर आहेत, असे म्हणत त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. चंद्रपूरमधील राजकीय तिढ्यावरही राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला. त्यामुळे आगामी राजकीय समीकरणांबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट असल्याचे दिसून आले. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. करारामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही भारत-अमेरिका व्यापार करारावरूनही राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्यांच्या मते, आपलं काहीतरी उघडं पडेल या भीतीपोटी मोदींनी अमेरिकेच्या पायाशी आणून ठेवलं आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. या करारामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरण अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प ठरवत आहेत, असा दावा करत त्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा उपस्थित केला. राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले राऊतांच्या या वक्तव्यांनी राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारवर एकाच वेळी हल्लाबोल करत त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. त्यांच्या या विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंधांबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. पुढील काही दिवसांत या वक्तव्यांवरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिक महापौरपदाच्या शुक्रवारी (6 फेब्रुवारी) होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपच्या हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांची नावे मंत्री गिरदश महाजन यांनी जाहीर केली. दरम्यान, उबाठाने या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात उडी मारली असून ठाकरेंच्या आदेशानंतर सीमा पवार यांनी अर्ज भरला. एका खासगी हॉटेलमध्ये मंगळवारी सकाळी 10 वाजता भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर मंत्री महाजन यांनी आडके आणि सानप यांच्या नावांची घोषणा केली. महिला खुला प्रवर्ग यासाठी घोषित महापौरपदासाठी भाजपतर्फे 16 नगरसेविका पात्र होत्या. त्यापैकी 5 जणी अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. दरम्यान शिंदेसेनेतर्फे उपमहापौरपदासाठी उपनेते विलास शिंदे, शहरप्रमुख प्रवीण तिदमे आणि नुकतेच काँग्रेसमधून आलेले राहुल दिवे यांनी अर्ज दाखल केले. वरिष्ठ पातळीवर सत्ता सहभागाच्या निर्णयाची शक्यता लक्षात घेऊन उपमहापौरपदाचा अर्ज भरल्याचे उपनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले. कुणाला पुढील टर्मचे आश्वासन, तर कुणाला समितीचा दिला शब्द भाजपतर्फे भामरे यांच्यासोबतच दीपाली गिते,दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे यादेखील महापौरपदासाठी इच्छुक होत्या. यापैकी काहींना पुढील अडीच वर्षानंतर महापौरपदाचे तर काहींना सध्याच्या टर्ममध्ये अन्य समित्यांचे अध्यक्ष, सभापतीपदांचे शब्द दिल्याचे कळते. खासगी हॉटेलमध्ये अडीच तास या वाटाघाटी चालल्या. त्यानंतर महाजन यांनी बाहेर येऊन आडके आणि सानप यांची नावे घोषित केली. 6 फेब्रुवारीला मतदान अधिकृत घोषणेसाठी 50 तास बाकी उबाठा सेनेला 79 पैकी फक्त 15 जागा मिळाल्या. दुसरीकडे भाजपला 72 जागांवर एकहाती बहुमत मिळाले. त्यामुळे विरोधकांकडून सर्व शस्त्रे म्यान करण्यात आली होती. दरम्यान उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शेवटच्या टप्प्यात आदेश आल्याने सीमा पवार यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला. शुक्रवारी भाजपच्या हिमगौरी आडके विरुद्ध उबाठाच्या सीमा पवार यांच्यात लढत होईल. महापौरपदी हिमगौरी आडके यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर या पदासाठी स्पर्धेत असलेल्या भाजपच्या नगरसेविका स्वाती भामरे यांना बैठकीतच अश्रू अनावर झाले. मंत्री महाजन यांना बाजूला घेत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यावर महाजन यांनी पुढील टर्ममध्ये तुमचा विचार केला जाणार असल्याचे सांगून त्यांची नाराजी दूर केली उपमहापौरपदासाठी शिंदेसेनेचे तिघे उद्या आणि परवा या दोन दिवसांत वरिष्ठ पातळीवर भाजप आणि शिंदेसेना यांच्यात सत्ता सहभागाबद्दल बोलणी होतील. त्यानुसार शिंदेसेनेला उपमहापौरपद दिले जाऊ शकते. तसे झाल्यास भाजपचे मच्छिंद्र सानप यांचा अर्ज मागे घेतला जाईल. शिंदेसेनेनतर्फे विलास शिंदे, प्रवीण तिदमे आणि राहुल दिवे या तिघांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. ज्येष्ठतेच्या निकषावर विलास शिंदे उपमहापौर होऊ शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले की, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल मला आनंद आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस त्या चर्चेत सहभागी नव्हते. मग त्याबद्दल बोलण्याचा त्यांना काय अधिकार होता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार कराराबाबत सावधगिरीचा इशारा दिला. कराराचा संपूर्ण मसुदा अद्याप सार्वजनिक झालेला नसला तरी आतापर्यंत समोर आलेल्या बाबींवरून भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी चिंता निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः अमेरिकेला भारतात कृषी उत्पादनांची निर्यात करण्याची तरतूद या करारात असण्याची शक्यता त्यांनी अधोरेखित केली. ही बाब देशातील शेती व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम करू शकते, असे त्यांचे मत होते. या पत्रकार परिषदेत पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरही भाष्य केले. संसदेत अर्थसंकल्प सादर होताना आपण नेहमी उपस्थित असतो, मात्र अजित पवार यांच्या अपघातामुळे यावेळी दिल्लीला जाता आले नाही, असे त्यांनी सांगितले. सभागृहात थेट उपस्थित राहून अंदाजपत्रक ऐकण्याची संधी मिळाली नसली तरी उपलब्ध माहितीनुसार काही मुद्दे लक्षात येतात, असे ते म्हणाले. सामान्य नागरिकांवर नवीन करांचा बोजा टाकलेला नाही, ही बाब समाधानकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, अर्थसंकल्पातून विकासाला अधिक चालना देणाऱ्या ठोस उपाययोजनांची अपेक्षा होती, असे पवार यांनी नमूद केले. केवळ करसवलती किंवा कर न वाढवणे यापलीकडे जाऊन अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अधिक ठोस निर्णय आवश्यक होते, अशी त्यांची भूमिका होती. विकास प्रक्रियेला वेग देण्यासाठी आवश्यक असलेले काही निर्णय अर्थसंकल्पात दिसून आले नाहीत, असे ते म्हणाले. स्थानिक उत्पादकांवर परिणाम भारत–अमेरिका व्यापार कराराबाबत बोलताना पवार यांनी अमेरिकेने भारतातून जाणाऱ्या वस्तूंवरील करांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख केला. मात्र या कर कपातीसोबतच कृषी क्षेत्रात अमेरिकेला भारतात निर्यात करण्याची संधी मिळणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. अमेरिका हा आर्थिकदृष्ट्या बलाढ्य देश असल्याने त्यांच्या उत्पादनांचा इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश झाल्यास स्थानिक उत्पादकांवर त्याचा परिणाम होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेणे आवश्यक भारतीय कृषी क्षेत्रावर तसा परिणाम होऊ नये, ही अपेक्षा व्यक्त करत पवार म्हणाले की, कराराचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यानंतरच सविस्तर भाष्य करणे योग्य ठरेल. सध्या ज्या बाबी जाहीर झाल्या आहेत, त्यावरून शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेणे आवश्यक आहे, हे मात्र निश्चित आहे. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने अशा कोणत्याही निर्णयाचा परिणाम व्यापक असतो, याची जाणीव ठेवून पुढील पावले उचलली जावीत, असे त्यांनी सुचवले.
मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक साधारण आठ तास पूर्णपणे ठप्प राहिली. मध्यरात्रीपर्यंत परिस्थिती धोकादायक असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद ठेवण्यात आला होता. गॅस गळती सुरू असल्याने प्रशासनाने कोणतीही जोखीम न घेता वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला. परिणामी हजारो वाहनचालक महामार्गावरच अडकून पडले. मध्यरात्रीनंतर धोका काही प्रमाणात कमी झाल्यानंतर अपघातग्रस्त टँकर तिसऱ्या लेनवर हलवण्यात आला. त्यानंतर मुंबईच्या दिशेने केवळ एका लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, वाहतुकीचा वेग अत्यंत मंद असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा कायम आहेत. सुमारे 15 तासांपासून या परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. टँकरमधून होणारी गॅस गळती अद्याप पूर्णपणे थांबलेली नसल्याने खबरदारी म्हणून हालचालींवर बंधने ठेवण्यात आली आहेत. या कोंडीमुळे अनेक प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. काही वाहनचालक पहाटे चार वाजल्यापासून तर काही जण रात्री तीन किंवा पाच वाजल्यापासून या ठिकाणी अडकले आहेत. दीर्घ प्रतीक्षेमुळे अनेकांची नियोजित फ्लाइट चुकल्याची माहिती समोर आली आहे. प्रवासाच्या नियोजनावर या घटनेचा मोठा परिणाम झाला असून लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. महामार्गावर इतक्या दीर्घकाळ अडकून पडल्याने प्रवाशांचा संयम सुटू लागल्याचे दिसून आले. या दरम्यान काही कॅन्सरग्रस्त रुग्णही वाहतुकीत अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. पाणी, अन्न आणि शौचालयांच्या सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांचे हाल झाले. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांना मोठा त्रास सहन करावा लागला. आपत्कालीन परिस्थितीत मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची भावना वाहनचालकांमध्ये तीव्रतेने व्यक्त होत आहे. वेगाने पावले उचलावीत घटनेनंतर वाहनचालकांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. टोल वसूल केला जातो, पण आपत्कालीन प्रसंगी महामार्ग इतका वेळ बंद का राहतो? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. तातडीने प्रभावी उपाययोजना करून महामार्ग पूर्णपणे मोकळा करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. एकाच लेनवर सुरू असलेली वाहतूक अपुरी असल्याने कोंडी कमी होण्यास वेळ लागत आहे. प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अधिक वेगाने पावले उचलावीत, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
एक लाख लोकसंख्येच्या अकोट शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अस्वच्छ परिसर, तुंबलेल्या नाल्या, अनियमित साफसफाईमुळे कर देणारे सर्वसामान्य नागरिक प्रशासनाला प्रश्न विचारत आहेत. प्रशासकराज असताना अनेकांनी कचऱ्याचा ठेकेदारीतून भक्कम माया जमवल्याचे बोलले जाते. मात्र निवडणुकीनंतर लोकनियुक्त प्रशासन असतानाही संबंधित ठेकेदारावर वचक नसल्याचे दिसते. नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी केवळ आश्वासन करत असल्याचे बोलले जात आहे. पालिकेत रुजू झाल्यापासून कर्मचाऱ्यांसोबत बैठकांमागे बैठका सुरू आहेत. परंतु कृती शून्य दिसून येत आहे. सततच्या बैठकांमुळे कर्मचारी देखील वैतागल्याची पालिकेत दबक्या आवाजात चर्चा आहे. प्रशासक असताना पाच ते सहा वर्षांत अकोट शहरात विकासकामांवर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला होता. मात्र तरीही स्वच्छता, दिवाबत्ती, रस्ते आदी मूलभूत प्रश्न आजही कायम असल्याचे दिसत आहे. शहरातील क्रीडा संकुल, शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील अतिक्रमण, भाजी मार्केट, उद्याने, क्रीडांगण, गटारी, स्वछतागृह, दिवाबत्ती आदी प्रश्न कायम आहेत. याबाबत गत पाच वर्षांत कोणत्याच उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. शहरातील साफसफाईसाठी वर्षाला लाखो रुपये कंत्राटदारास अदा केले जातात. परंतु, पैसा खर्च करुनही अनेक भागात अस्वच्छता दिसून येत आहे. शहरात रस्ते व गटारीची कामे करण्यात आली. परंतु, त्यातील बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. शहरातून जाणारे अनेक लहान मोठे नाले आजही कचऱ्यामुळे तुंबलेले आहेत,गेल्या कित्तेक महिन्यांपासून नाले सफाई होत नसल्याने झाडे झुडपे वाढलेली आहे, वस्त्यांमध्ये नियमित साफसफाई होत नसल्याचे स्थानिक नागरिक सांगतात,काही ठिकाणी नाल्यात वाहून आलेला कचरा काठावर काढल्यानंतर तो तसाच ठेवून दिला जात आहे. शहरात महिलांसाठी अद्याप एकही स्वछतागृह नाही. त्यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे. एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहराची स्थिती दयनीय झाली आहे. पालिकेत अकोट शहर विकास मंच गट स्थापन करण्यात आला आहे. शहर विकासाकरिता नवे कारभारी निवडले आहेत. प्रशासकराज संपुष्टात येऊन लोकनियुक्त नगरसेवकांनी शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवाव्या, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. स्वच्छतेसाठी अकोट नगरपरिषद महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करते. यासाठी १७ घंटागाड्या, ८ ट्रॅक्टर, एक जेसीबी (भाडे तत्त्वावर) याकामी ठेवण्यात आले आहे. आरोग्य निरिक्षण आणि ४ मुकादमांसह १५२ कर्मचारी स्वच्छतेच्या कामी असतात. तरीही नाल्या तुंबल्या असून वेळेवर साफसफाई केली जात नाही. पार्किंगची समस्येमुळे वाहतूक कोंडी वाढते शहरीकरण पाहता अकोट शहरात कोठेच पार्किंगची व्यवस्था नाही. वाहने मिळेल त्या ठिकाणी उभी करत वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात येत आहे. अनेकदा रस्त्यावर उभ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. फुटपाथवर विक्रेत्यांचा ठिय्या, रस्ते झाले अरुंद शहरात हातगाडी लागून व्यवसाय करणाऱ्या फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी फुटपाथवर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होऊन चालणे कठीण झाले आहे. शहरात दररोज कचरा संकलित केला जात असला तरी गल्लीबोळात ही व्यवस्था अपुरी पडत आहे. काही ठिकाणी कचरा तसाच पडून असला तरी तो गोळा केला जात नाही. दररोज शहरामधून कचरा संकलन नावालाच ^विविध प्रभागात घाणीचे साम्राज्य आहे, दररोज कचरा संकलन नावालाच आहे. शहरात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. स्वतंत्र भाजी मार्केट नाही. गत पाच वर्षांपूर्वी जे प्रश्न होते, ते आजही कायम आहेत. - विजय ढेपे, सामाजिक कार्यकर्ते.
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:पडताळणीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा नकार; लाभ मिळण्यास होणार विलंब
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी पडताळणीत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. तसे पत्रच प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे आता सात बाल विकास प्रकल्प अधिकारी ४५ हजार लाभार्थींची पडताळणी करत आहेत. ही माहिती शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थी व सीडीपीओ यांची संख्या, शासनस्तरावरून निर्णयासाठी लागणारा विलंब आदींमुळे लाभ मिळण्यास विलंब होणार आहे. लोकसभा निवडणुकीत जागा घटल्यानंतर तत्कालीन महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करत लाकडी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. मात्र या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर प्रचंड ताण आला असून, निकषांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. निवडणुकीनंतर बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली. टप्याटप्याने लाडक्या बहिणी नावडत्या होत आहेत. लाडक्या बहिणींनी ३१ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय बँकेत केवायसी पूर्ण करण्याची अट होती. ती पूर्ण न करणाऱ्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा लाभ मिळालेला नाही. आता पडताळणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ४१ हजार ६३४ अर्जदार लाभाला मुकले होते. पात्र असलेल्या ४ लाख ३ हजार लाडक्या बहिणींना अर्थसाहाय्य देण्यात आले. आता पुन्हा ४५ हजार लाभार्थ्यांवर टांगती तलवार आहे. वाहन : चार चाकी वाहन असलेल्या ५ हजार ५०८ लाभार्थींच्या लाभाला ब्रेक बसला. शिधापत्रिका : एकाच शिधापत्रिकेत दोन पेक्षा जास्त महिलांना अर्थ सहाय्य मिळत असल्याने त्या २९ हजार ५७१ लाभार्थींचे अनुदान थांबवण्यात आले आहे. जन्म तारीख : जिल्ह्यातील ६ हजार ५५५ लाभार्थींच्या जन्म तारखेबाबत स्पष्टता नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आता सर्वेक्षणात जन्म तारखेचा दाखला व आधार कार्ड तपासण्यात येत आहे. आधार कार्डावरील जन्मतारीख अंतीमत: गृहित धरण्यात येणार आहे. निराधार : संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या १३ लाभार्थींनी आम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ हवा, असे लिहून दिले आहे. निकषांच्या अंमलबजावणीमुळे होतेय लाभार्थी संख्या कमी पडताळणी सुरू ^मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थींच्या पात्र-अपात्रतेबाबत पडताळणीचे काम बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) करत आहेत. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. सीडीपीओच ही माहिती गुगल ड्राइव्हवर भरणार आहेत. पुढील निर्णय हा शासनस्तरावर होणार आहे. - गिरीष पुसदकर, महिला व बाल कल्याण अधिकारी या बाबींची पडताळणी योजनेच्या निकषानुसार लाभार्थींच्या पात्र-अपात्रेबाबत पडताळणी होत आहे. निकषात ‘लाभार्थीचे वय २१ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त नसावे, लाभार्थी केवळ महिला असावी, लाभार्थींच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी, सरकारी विभागात कंत्राटी कर्मचारी, निवृत्ती वेतन घेणारा नसावा, आदींचा समावेश आहे. अंगणवाडी कर्मचारी वेठबिगार आहेत का? ^कोणत्याही कामासाठी शासनाला अंगणवाडी कर्मचारीच दिसतात. अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे शिक्षण, आरोग्य, कुपोषण मुक्तीसाठीचे काम असून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आम्ही एकात्मिक बालविकास योजनेच्या कामाव्यतिरिक्त कोणतेही काम करणार नाही. - कॉ. नयन गायकवाड, राज्य सचिव, आयटक.
निकाल लागल्यापासून महिनाभराच्या आंत निवडणूक खर्चाचा अहवाल सादर केला नसल्याने नगरपालिका व नगरपंचायतीच्या शंभरावर उमेदवारांना नोटीस देण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे पाऊल उचलण्यात आले असून त्या-त्या नगरपालिकांनी नोटीस बजावताना संबंधितांना आठवडाभराची मुदत दिली आहे. या नोटीसनंतरही संबंधित उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे अंतिम हिशेब सादर केले नाही तर तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त होणार असून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांना नोटीस धाडल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल गेल्या महिन्यात १६ डिसेंबर रोजी घोषित झाला. त्या तारखेपासून महिनाभराच्या आंत सर्व उमेदवारांना आपापल्या निवडणूक खर्चाचे अंतिम हिशेब त्या-त्या ठिकाणच्या तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात सादर करावयाचे होते. परंतु अजूनही शंभरावर उमेदवारांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांना नोटीस धाडण्यात आल्या आहेत. या निवडणुकीत अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चिखलदरा, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड व शेंदुरजनाघाट या १० नगरपालिकांसह नांदगाव खंडेश्वर आणि धारणी या दोन नगरपंचायतींचे नगराध्यक्ष (एकूण १२) आणि २७८ नगरसेवक निवडून द्यावयाचे होते. त्यानुषंगाने नगराध्यक्षांसाठी ६४ आणि नगरसेवकांसाठी १०४८ उमेदवार मैदानात होते. यापैकी बहुतेक उमेदवारांनी प्रचारासह निवडणुकविषयक केलेला एकूण खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. परंतु अद्यापही शंभरावर उमेदवारांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित नगरपालिका प्रशासनाने त्यांना नोटीस धाडल्या असून आठवडाभराची मुदत दिली आहे. या मुदतीत खर्च सादर न झाल्यास जिल्हाकचेरीतून पुन्हा नोटीस धाडल्या जाणार आहे. ...तर ६ वर्षे निवडणूक लढवण्यासाठी बंदी नगरपालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय या दोन्ही यंत्रणांमार्फत धाडल्या जाणाऱ्या नोटीसनुसार कृती न केल्यास संबंधित उमेदवारांचा तपशिल थेट राज्य निवडणूक आयोगाला कळविला जाणार आहे. या तपशिलातच जिल्हाधिकारी संबंधितांवर कारवाईची शिफारस करणार आहेत. त्या शिफारसीनुसार राज्य निवडणूक आयोग संबंधित उमेदवारांवर ६ वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घालणार आहे.
राज्यातील विविध सरकारी विभागांकडून होणाऱ्या अनावश्यक आणि मनमानी खरेदीवर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णायक पावले उचलली आहेत. अर्थखात्याची सूत्रे स्वतःकडे घेतल्यानंतर त्यांनी नव्या निविदा काढण्यावर तसेच खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर तातडीची बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. वित्त विभागाकडून सर्व प्रशासकीय यंत्रणांना कळवण्यात आले आहे की, 15 फेब्रुवारीपासून कोणत्याही प्रकारच्या खरेदी प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार नाही आणि नव्या निविदा प्रक्रियेलाही विराम दिला जाईल. या निर्णयामुळे वर्षअखेरच्या काळात होणाऱ्या खर्चाच्या पद्धतीवर मोठा परिणाम होणार आहे. या आदेशाच्या कक्षेत फर्निचर दुरुस्ती, ड्रायव्हर मशीन, संगणक व इतर उपकरणे, सुटे भाग खरेदी, कार्यालये भाड्याने घेणे, सेमिनार, भौतिक कार्यशाळा अशा अनेक खर्चांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच नियमित प्रशासकीय गरजांच्या नावाखाली होणाऱ्या विविध खरेदींना तात्पुरता ‘ब्रेक’ लावण्यात आला आहे. मात्र, औषध खरेदीला या निर्बंधातून वगळण्यात आले असून आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला आवश्यक औषधसाठा खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय केंद्र पुरस्कृत योजना, त्याअंतर्गत राज्य हिस्सा आणि बाह्य सहाय्यित प्रकल्पांतील खरेदी प्रस्तावांना देखील या बंदीतून सूट देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या टप्प्यावर अनेक विभागांकडून उपलब्ध निधी खर्च करण्यासाठी घाईघाईने खरेदी केली जाते, असा आरोप अर्थ विभागाकडून करण्यात आला आहे. केवळ मंजूर निधी परत जाऊ नये, या उद्देशाने वर्षअखेर अनावश्यक वस्तूंची खरेदी होते, असा निष्कर्ष वित्त विभागाच्या आढाव्यातून समोर आला आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर अनावश्यक ताण निर्माण होतो. ही प्रवृत्ती रोखण्यासाठीच हा कठोर निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थखात्याचा सखोल आढावा घेत खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. हा आदेश सर्व प्रशासकीय विभाग, त्यांच्या अधिनस्त कार्यालये, शासकीय महामंडळे, अनुदानित संस्था तसेच नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनाही लागू असेल. त्यामुळे राज्यातील प्रशासनाच्या सर्व स्तरांवर या निर्णयाचा परिणाम दिसून येणार आहे. कार्यालयीन सोयीसुविधा, प्रशिक्षण कार्यक्रम, उपकरणे दुरुस्ती यांसारख्या नियमित खर्चांनाही या निर्बंधाचा फटका बसणार आहे. मात्र, अत्यावश्यक सेवांमध्ये खंड पडू नये याची काळजी घेत औषध खरेदीसारख्या बाबींना सूट देण्यात आली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर वाढलेल्या ताणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतुदी लागणाऱ्या योजनांमुळे खर्चाचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक ठरले आहे. त्यातच वर्षअखेरचा काळ असल्याने विभागांकडून होणाऱ्या खर्चावर अंकुश ठेवणे गरजेचे असल्याचे वित्त विभागाचे मत आहे. त्यामुळे आगामी काही आठवड्यांत सरकारी यंत्रणांमध्ये खरेदीविषयक प्रक्रिया पूर्णपणे मंदावलेली दिसण्याची शक्यता आहे. अर्थ आणि नियोजन खाते फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काळात अर्थखातं त्यांच्याकडे होते. त्याचबरोबर क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक विकास ही खातीही त्यांनी सांभाळली होती. त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ ही खाती त्यांच्याकडे देण्यात आली. मात्र, अजित पवारांकडे असलेले अर्थ आणि नियोजन खाते सध्या त्यांच्याकडे देण्यात आलेले नाही. हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे. 6 मार्च रोजी मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करणार येत्या 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2026-27 या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वीच खर्चावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने खरेदी प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. पुढील काळात अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहील, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. मात्र, सध्या तरी अर्थखात्याची सूत्रे फडणवीसांच्या हाती असल्याने त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्याच्या आर्थिक शिस्तीबाबत सरकारचा स्पष्ट संदेश गेला आहे. आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय प्रशासनात आणि राजकारणातही चर्चेचा विषय ठरला आहे.
मेळघाटच्या आरोग्य सेवेतील उणीवांच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने अलिकडेच जिल्ह्याच्या आरोग्य विभागासह राज्य सरकारला धारेवर धरले. त्यानुषंगाने जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने काही नव्या उपाययोजना हाती घेत डीपीसीच्या (जिल्हा नियोजन समिती) माध्यमातून शासनाकडे १३६ कोटी १० लाख रुपयांची मागणी केली आहे. ही मागणी शासनाने आखून दिलेल्या बजेटच्या तुलनेत ६४ कोटी रुपयांनी अधिक आहे. परंतु आर्श्चयाची बाब अशी की शासनाने अतिरिक्त रक्कम तर सोडाच, गतवर्षीच्या तरतुदीपेक्षाही १७ कोटी रुपयांनी कमी केवळ ७२ कोटी रुपयाला मंजुरी दिली आहे. या विचित्र व्यवहारामुळे आरोग्य विभाग चक्रावून गेला असून, उपाययोजना करायच्या तरी कशा, असा अजब पेच अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जिल्हा परिषदेचे डीएचओ कार्यालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक (सीएस) यांनी संयुक्तपणे आरोग्य सेवा संबंधिचा सन २०२६-२७ चा आराखडा तयार केला आहे. जिल्हा परिषदेने ७७ कोटी ५५ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली असून उर्वरित मागणी ही जिल्हा शल्य चिकित्सक उर्वरित. पान ४ डॉ. श्यामसुंदर निकम, निवृत्त सीएस, अमरावती. पुरेशा निधीअभावी कामे कशी करणार तोकडे मनुष्यबळ, भौगोलिक स्थितीच्या मर्यादा, निसर्गदत्त अडसर, आदिवासींच्या चालीरिती अशा वेगवेगळ्या अडथळ्यांवर मात करीत मेळघाटात आरोग्य विभागाला काम करावे लागते. त्यामुळे बरेचदा पुरेशा प्रमाणात आरोग्य सेवा पुरविणे शक्य होत नाही. परिणामी मेळघाटची आरोग्य व्यवस्था वारंवार चर्चेत येते. या पार्श्वभूमीवर तेथे अतिरिक्त उपाययोजना सुचवल्या जातात. परंतु जे शासन या उपाययोजना सूचविते, तेच शासन पुरेशा प्रमाणात रक्कम पुरवणार नसेल तर अधिकारी कामे कशी करणार, असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे. तीन प्रधान सचिवांनी मेळघाटात पोहोचून जाणून घेतली वास्तविकत: मेळघाटमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा ही नेहमीची डोकेदुखी बनली आहे. सरकार ज्या पद्धतीने कागदोपत्री बोलते, ती वास्तविकतः नसते म्हणून पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, ‘महान’चे डॉ. आशिष सातव आणि ‘खोज’संस्थेचे ॲड. बंड्या साने यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने राज्य शासनाला चांगलेच फटकारले होते. त्यानुसार अलिकडेच तीन प्रधान सचिवांनी प्रत्यक्ष मेळघाटात पोहोचून तेथील वास्तविकत: जाणून घेतली. त्यानंतर न्यायालयाने काही उपाययोजना सुचवल्या आहेत. आता त्या कधीपूर्ण होणार याकडे तेथील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यतत्पर, शिस्तप्रिय व जनसामान्यांशी नाळ जपणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून अजितदादा पवार यांचा अस्थीकलश सोमवारी दिवसभर अमरावतीत ठेवल्यानंतर आज, मंगळवारी सकाळी गुरुकुंज मोझरी येथील अस्थीकुंडात विसर्जीत करण्यात आला. विसर्जनापूर्वी राष्ट्रवादीचे सरचिटणीस आमदार संजय खोडके व अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांच्या अमरावती येथील जनसंपर्क कार्यालयात सोमवारी या अस्थीकलशाचे अनेकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर आज पहाटे या कलशाचे आमदार संजय खोडके यांच्या हस्ते राष्ट्रसंतांचे महासमाधीस्थळ असलेल्या गुरुकुंज मोझरी येथे विसर्जन करण्यात आले. पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी ध्यानसाधनेच्या वेळी प्रार्थना मंदिरात अत्यंत श्रद्धाभावाने काही काळ हा अस्थीकलश ठेवण्यात आला. ‘सप्रेम जयगुरुदेव’च्या घोषाने संपूर्ण गुरुकुंज परिसर भक्तिमय व शोकाकुल वातावरणाने भारावून गेला होता. याप्रसंगी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळून गेले. अनेकांच्या मनातही कृतज्ञतेची भावना दाटून आली होती. दिवंगत अजितदादा पवार यांचे नेतृत्व, प्रशासकीय अनुभव, सामाजिक बांधिलकी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी असलेली तळमळ यांचा उपस्थित मान्यवरांनी यावेळी भावपूर्ण शब्दांत उल्लेख केला. या भावपूर्ण कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे, शहराध्यक्ष प्रशांत डवरे, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय सरचिटणीस पद्मश्री जनार्दनपंत बोथे, डॉ. राजाराम बोथे, जिल्हा परिषदेच्या सुरेखाताई ठाकरे, राकाँचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष अविनाश ठाकरे, कार्याध्यक्ष प्रवीण भुजाडे, अविनाश मार्डीकर, निखिल ठाकरे, नवनियुक्त नगरसेवक प्रमोद महल्ले, डॉ रघुनाथ वाडेकर, भोजराज काळे, विशाल खोडके, राहुल मानकर,प्रकाश मक्रमपुरे, नगरसेवक योगेश सवई, यश खोडके, माजी अध्यक्ष भूषण यावले, तालुकाध्यक्ष दिलीप भुयार, कार्याध्यक्ष प्रकाश पडोळे आदी उपस्थित होते.
गेल्या तीन दिवसांपासून येथे सुरु असलेल्या जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद (जनरल चॅम्पीयनशीप) धारणी पंचायत समितीच्या चमूने जिंकल्यामुळे ही चमू धुरंधर ठरली. गतवर्षीही याच संघाचा दबदबा होता. दरम्यान यावर्षीच्या सांस्कृतिक स्पर्धांमध्येही धारणीच्या संघाने उपविजेपद पटकावून सर्व १४ तालुक्यांवर छाप सोडली आहे. येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि किरण नगरातील नरसम्मा हिरय्या महाविद्यालच्या मैदानात जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या, तर सांस्कृतिक समारंभ विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरातील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात पार पडला. पहिल्या दोन दिवसांच्या सायंकाळी सांस्कृतिक स्पर्धा तर सतत तिन्ही दिवस क्रीडा स्पर्धा असे हे आयोजन होते. यामध्ये जिल्हाभरातील सर्व १४ तालुक्यांच्या १४ आणि जिल्हा परिषद मुख्यालयाची एक अशा एकूण १५ चमू सहभागी झाल्या होत्या. या सर्वांवर मात करुन धारणीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. सुमारे ३ हजार खेळाडूंचा सहभाग असलेल्या क्रीडा स्पर्धेत धारणीच्या संघाने सांघिक आणि वैयक्तीक क्रीडा स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावले. कबड्डी, फुटबॉल, बॅडमिंटन, जलतरण आणि धावस्पर्धेत या खेळाडूंनी अव्वल पुरस्कार प्राप्त केले. त्यामुळे धारणीला सर्वसाधारण जेतेपद देण्यात आले. मेळघाटचे नाव उज्वल करणाऱ्या धारणीने गेल्यावर्षीही क्रीडा स्पर्धेतील दबदबा कायम ठेवला होता. विजेत्या चमूला सीईओ संजीता महापात्र, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, डेप्युटी सीईओ श्रीराम कुळकर्णी, बाळासाहेब बायस, विलास मरसाळे, शिक्षणाधिकारी सतिश मुगल, योजना शिक्षणाधिकारी सुरेश वाघमारे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, बिडीओ स्नेहल शेलार, स्वप्निल मगदुर, अभिषेक कासोदे, सुधीर अरबट, तुषार दांडगे, विनोद खेडकर, प्रफुल्ल भोरखडे व विजय गायकवाड, गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे, संदीप बोडखे, विनोद गाडे, पंकज गुल्हाने आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर मान्यवरांनी धारणीच्या सर्व खेळाडू आणि कलावंतांचा सत्कारही केला. प्रारंभी तीन दिवसीय क्रीडा महोत्सवातील सांघिक खेळ, वैयक्तीक खेळ, दिव्यांग खेळाडू, सांस्कृतिक कार्यक्रमातील कलावंत यांना चषक, प्रमाणपञ देण्यात आले. प्रास्ताविक श्रीराम कुळकर्णी, सुञ संचालन मनिष काळे व शैलेन्द्र दहातोंडे यांनी केले. आभार उपशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्या करीता विविध समित्यांचे प्रमुख, उपप्रमुख, सदस्य तसेच प्रसिद्धी विभागाचे पदाधिकारी विनोद गाडे, राजेश सावरकर, विनायक लकडे, शरद गढीकर, हेमंतकुमार यावले, पुनम उके यांनी परिश्रम घेतले सांस्कृतिक कार्यक्रमाचे सर्वसाधारण जेतेपद नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीने पटकावले, तर धारणीच्या चमूला उपविजेतेपद देण्यात आले. भक्तीगीत स्पर्धेत श्रीकांत मुंडेकर चांदुर बाजार विजयी, किरण बुल उपविजयी ठरले. सिनेगीत/युगलगीतमध्ये सविता मेश्राम नांदगाव खंडेश्वर विजयी, डॉ. अनिल माकोडे चिखलदरा उपविजयी ठरले. एकलनृत्यमध्ये योगिता चव्हाण नांदगाव खंडेश्वर विजयी, अमृता नायसे वरुड उपविजयी, समुहनृत्यात नांदगाव खंडे विजयी तर अमरावतीची चमू उपविजयी ठरली. कराओकेमध्ये स्मिता शिरवाने चिखलदरा विजयी, शेख बिसमिल्लाह अचलपूर उपविजयी ठरले असून हास्यजत्रा प्रकारात तिवसा विजयी आणि धामणगावचे कलावंत उपविजयी ठरले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सर्वसाधारण जेतेपद नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीने पटकावले
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) जनजागृती अभियानाचा एक भाग तसेच गुणवत्ता वाढ हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन येथील सर्वात मोठ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेने ‘स्कुल कनेक्ट’ अभियान सुरु केले आहे. संस्थेच्या मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्षांतर्गत सुरु करण्यात आलेल्या या अभियानाचा पहिला प्रयोग भानखेडा (बुद्रुक) येथील शाळेत करण्यात आला. महाविद्यालयाच्या आयक्यूएसी व इंग्रजी विभागाने त्यासाठी पुरेपूर श्रम उचलले आहेत. या कार्यक्रमाला श्री शिवाजी हायस्कूल, भानखेड़ाचे मुख्याध्यापक सतीश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि रोपे देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व शिक्षकांचे महाविद्यालयाच्यावतीन े प्रा. डॉ. सविता ठाकरे यांनी स्वागत केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि गुणवत्ता वाढीबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने डॉ. ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० म्हणजे काय, त्याची गरज, या धोरणांतर्गत विद्यार्थ्यांना विषय निवडीसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधी आणि भविष्यात विविध क्षेत्रांमध्ये व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी कोणती कौशल्ये आत्मसात केली पाहिजे, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. सपना राऊत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार वऱ्हाडे यांनी मानले. मुख्याध्यापक पाटील यांनी आपल्या भाषणात वक्त्यांचा परिचय करून दिला आणि भविष्यात अशा जनजागृती कार्यक्रमांची गरज असल्याचे अधोरेखित केले. मानवी मूल्यांची शिकवण देणाऱ्या एका सुंदर प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. इंग्रजी विभागाच्या प्रीती जवंजाळ आणि महाविद्यालयाचे विद्यार्थीही या वेळी उपस्थित होते. विद्यार्थी, शिक्षकही झाले व्यक्त या वेळी विद्यार्थ्यांसाठी एका संवाद सत्राचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बद्दल प्रश्न विचारले आणि आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले. व्याख्यान आटोपल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अभिप्राय सत्राचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि शिक्षकांनीही आपली मते मांडली.
बार्शी स्वतःच्या बुद्धिमत्तेची ओळख करून घ्या. स्वतःच्या ध्येयावर प्रेम करा आणि स्वतःला ओळखा त्यातूनच आपले करिअर शोधा, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी तथा वक्ते इंद्रजीत देशमुख यांनी केले. रविवारी (दि.१) श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेचे संस्थापक, संवर्धक व प्रेरणास्त्रौत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त देशमुख यांचे प्रेरक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी वाय यादव होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे तथा जनरल सेक्रेटरी पी.टी. पाटील, सहसचिव ए.पी देबडवार, खजिनदार तथा सांस्कृतिक प्रमुख जयकुमार शितोळे उपस्थित होते. देशमुख पुढे म्हणाले की, मोबाइलपासून दूर रहा संवेदनशीलता जोपासा अध्ययनशील रहा आई वडिलांचा आदर करा. राष्ट्रप्रेम जागृत ठेवा. तसेच डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या कार्य कर्तृत्वावर बोलताना देशमुख म्हणाले कर्माचे भान असणारा तो कर्मवीर. म्हणूनच कर्मवीर मामांचे विचार दैनंदिन जीवनात जोपासा व करुणेला कृतीची जोड द्या. प्रास्ताविक पी.टी पाटील यांनी केले. प्रेरक व्याख्यात्त्यांचा परिचय जयकुमार शितोळे यांनी करून दिला. आभार प्राचार्य डॉ. दीपक गुंड यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. ज्योती डमरे यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेतील पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. अध्यक्षीय समारोपात डॉ. यादव यांनी कर्मवीर जयंती सोहळा या विषयी माहिती दिली. संस्थेच्या वतीने सातत्याने विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले जाते. यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते, अशा प्रकारच्या प्रेरक व्याख्यातूनच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते असे सांगितले.
नेवासे नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रोत्सवानिमित्त गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी ७ ते ८ यावेळेत झालेल्या अमृतवाहिनी प्रवरामाईच्या महाआरती सोहळ्याला संत-महंतांसह हजारो भाविकांनी हजेरी लावून प्रतिसाद दिला. गंगा गोदावरी माता की जय, अमृतवाहिनी प्रवरामाता की जय च्या गजराने येथील परिसर दुमदूमला होता. तर यावेळी झालेल्या दीपोत्सवाने प्रवरामाई उजळून निघाली होती. नेवासे येथील गणपती घाटावर श्री मोहिनीराज यात्रा कमिटीच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी झालेल्या अमृतवाहिनी प्रवरामाईच्या आरती सोहळयाला देवगड गुरूदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत राष्ट्रसंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज,सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे महंत उद्धव महाराज मंडलिक, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरीजी महाराज, नेवासा येथील रामकृष्ण विवेकानंद आश्रमाचे प्रमुख बालब्रम्हचारी ज्ञानेश्वर महाराज,घोगरगाव आश्रमाचे बालब्रम्हचारी विश्वनाथ महाराज,गहिनीनाथ महाराज आढाव,चक्रधर स्वामी आश्रमाचे महंत धनंजय मुनी महाराज, बाळू महाराज कानडे,हरी महाराज भोगे, पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात गंगा पूजन करण्यात आले. गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराजांच्या हस्ते प्रवरामाईला साडी चोळी अर्पण करण्यात आली. यावेळी तबलावादक कृष्णा कुलकर्णी यांनी झालेल्या भजन प्रसंगी उत्कृष्ट संगीत साथ दिली.गंगा आरतीच्या झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न युवा पुरोहित निखिलगुरू जोशी, अभिजित बडवे, मयूर जोशी, लक्ष्मीकांत जोशी यांनी केले. या गंगा आरती सोहळ्याला नेवासे बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, उपनगराध्यक्ष अॅड. संजय सुखदान, श्री मोहिनीराज मंदिर देवस्थानचे अध्यक्ष जयेश बडवे, बाळासाहेब पाटील, रविंद्र जोशी, जयवंत देवचक्के तसेच नगरसेवक, यात्रा कमिटीचे सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड. मयूर वाखुरे यांनी केले. धार्मिक उपक्रमांमुळे देशाची ताकद, संस्कार वृद्धिंगत अमृतवाहिनी प्रवरामाईची आरती हरिद्वारसारखे दृश्य निर्माण करणारी आहे. अशा धार्मिक उपक्रमांमुळे देशाची खरी शान, ताकद व संस्कार वृद्धिंगत होतात,” असे मत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले. गंगा आरती सोहळयासाठी नाशिक येथील गंगा-गोदावरी पंचकोटी आरती समूहातील आचार्य वेदमूर्ती अमित पंचभैय्ये,अलोक गायधनी,शेखर शुक्ल,सदानंद देव,गौरव पंचभैय्ये,पुष्कराज जोशी,शुभम भालेराव गंगापूजन व आरती सोहळयाला उपस्थिती होती.
आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. सूर्यनमस्कार हा केवळ शारीरिक व्यायाम नसून तो शरीर, मन आणि विचार यांचा समतोल राखणारा जीवनमार्ग आहे. विद्यार्थ्यांनी रोजच्या दिनक्रमात सूर्यनमस्काराचा समावेश केल्यास आत्मविश्वास वाढेल, आरोग्य सुदृढ राहील आणि सकारात्मक विचारांची जडणघडण होईल, असे प्रतिपादन दास नवमी उत्सव समिती प्रमुख श्रीपाद कुलकर्णी यांनी केले. दास नवमी उत्सवानिमित्त सावेडीतील श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेत सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शहरातील विविध भागांतील तब्बल ३५ संघांनी सहभाग नोंदवून या स्पर्धेला प्रतिसाद दिला. दास नवमीच्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व नैतिक विकासावर भर देण्यात आला. सूर्यनमस्काराच्या माध्यमातून आरोग्य, शिस्त, एकाग्रता व सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्याचा उद्देश या स्पर्धेतून साध्य करण्यात आला. सहभागी संघांनी एकसंध, तालबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार सादर करत उपस्थितांची विशेष दाद मिळवली. संपूर्ण परिसर योगमय आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला होता.यावेळी शालेय समितीचे चेअरमन ॲड. किशोर देशपांडे, सेक्रेटरी सुरेश शिरसागर, संस्थेचे कार्यकारणी सदस्य स्वप्निल कुलकर्णी, सुनील जोशी, संध्या कुलकर्णी, संजय कुलकर्णी, प्राचार्या वसुधा जोशी, मुख्याध्यापक सुनील कानडे, मुख्याध्यापिका धनश्री गुंफेकर, मुख्याध्यापक अजय महाजन, पर्यवेक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन संकेत शिंदे यांनी, तर आभार क्रीडा शिक्षक लोंढे यांनी मानले. या सूर्यनमस्कार स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांत योगाभ्यासाची आवड निर्माण होऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
धर्म, जात आणि संस्कृती पाळा तीचे जतन करा. स्वच्छतेचा धर्म सर्वांनी पाळा आणि त्याची सुरुवात स्वतःपासून करा. विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक वाटचाल करताना अणुशासन, शिस्त आणि कौशल्य या त्रिसूत्री चा वापर करावा. त्याचे फलित म्हणून आज आपणास कृषिचे विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवताना दिसतात, असे प्रतिपादन भेंडे येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा साहित्यिक डॉ. शिरीष लांडगे यांनी केले. सोनई कृषि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप बेल्हेकरवाडी येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हरी मोरे होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.विद्यार्थी कल्याण तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.संदीप तांबे यांनी प्रास्ताविकेत सात दिवस राबवलेल्या विविध कामाची व उपक्रमाची माहिती दिली. विशेष श्रम संस्काराच्या शिबिरातून स्वयंसेवकांना नवनवीन काम करण्याची ऊर्जा मिळत असते कारण तो नेहमी नवनवीन शोधत असतो असे प्रतिपादन सकाळचे पत्रकार तथा पसायदान आनंदचे उपाध्यक्ष विनायक दरंदले यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ.हरी मोरे म्हणाले, शिस्त आणि सारखेपणा यातून स्वयंसेवक घडत असतो. विशेष श्रमसंस्कार शिबिरातून घडणारे स्वयंसेवक आपल्या कामाने स्वतःची छाप समाजावर पाडत असतात. भूषण भगत आणि मनीष चव्हाण या स्वयंसेवकांनी आपले सात दिवसातील आलेले अनुभव सांगितले. उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सुरज जाधव व प्रणाली मिसाळ यांची निवड करण्यात आली. त्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, ट्रॉफी व बुके देऊन सन्मान करण्यात आला तर अनुराग लांडगे याचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी गावात स्वयंसेवकांनी सकाळी प्रभात फेरी काढली. ऋषिकेश वाघोले, समीक्षा ढोबळे व महादेव मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले तर ऋतुजा दहिफळे हिने आभार मानले. कार्यक्रमासाठी कानिफनाथ येळवंडे, मच्छिंद्र दरंदले, दत्तात्रय बेल्हेकर, नितीन काकडे, संगीता आंधळे, प्रा. प्रवीण इंगोले व ५२ स्वयंसेवक उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे यश हे महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी खासदार ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या संकल्पनेतील वृक्षारोपण संकल्पना, महाविद्यालयाची खेळातील प्रगती, एम एसस्सीच्या विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेत मिळवलेले यश हे संस्थेसाठी आणि महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे, असे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे म्हणाले.
नगरपरिषदेच्या सहा विषय समित्यांवरील सभापती व सदस्य तसेच स्थायी समितीच्या सदस्यांची निवड मंगळवारी नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. नवनिर्वाचित नगरसेवकांची विशेष सभा पिठासिन अधिकारी तथा मालेगावचे उपविभागीय अधिकारी नितीन सद्गीर यांच्या अध्यक्षतेखाली, तर मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सभेस नगराध्यक्षांसह एकूण ३२ सदस्य उपस्थित होते. नगरपालिकेत शिवसेना-रिपाइं-भाजप युतीकडे २६ नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने सत्ताधारी महायुतीच्या दहा सदस्यांची स्थायी समितीवर अविरोध निवड झाली. उबाठा गटाचे चार व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे पाच सदस्य असूनही आवश्यक संख्याबळ नसल्याने स्थायी समितीवर त्यांचा एकही सदस्य निवडून येऊ शकला नाही. दरम्यान, सहा विषय समित्यांच्या सभापतीपदी सत्ताधारी महायुतीच्या नगरसेवकांची निवड करण्यात आली असून काही समित्यांमध्ये विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना सदस्यपद देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी आमिन शेख (पटेल) यांची निवड करण्यात आली. या समितीत विरोधी उबाठाचे दीपक दराडे यांना सदस्यपद देण्यात आले. स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीत पूजा लोकेश साबळे यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली. विरोधी दीपक दराडे यांना सदस्यपद देण्यात आले. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीत सभापतीपदी डॉ. सुहास जाधव यांची निवड करण्यात आली. तर विरोधी राष्ट्रवादीचे संतोष आहिरे यांना सदस्यपद देण्यात आले. पाणीपुरवठा जलनिःस्सारण समिती सभापतीपदी विशाल राजेंद्र आहिरे यांची निवड करण्यात आली. तर विरोधी राष्ट्रवादीचे संतोष आहिरे यांना सदस्यपद देण्यात आले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पूजा लालसरे यांची निवड करण्यात आली. तर विरोधी उबाठाच्या रेखा संजय कटारे यांना सदस्यपद देण्यात आले. नियोजन व विकास समितीचे पदसिध्द सभापती म्हणून उपनगराध्यक्ष मुकूंद गौतम एळींजे हे राहणार आहेत. तर विरोधी उबाठाच्या रेखा संजय कटारे यांना सदस्यपद देण्यात आले. प्रतिनिधी | नांदगाव नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्य निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. शिवसेनेचे येथे एकोणीस सदस्य आहेत. एकमेव अपक्ष व शिवसेनेला पाठींबा देणारे सदस्य काशिनाथ देशमुख यांची सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी तहसीलदार सुनील सैंदाने होते. निवड झालेल्या सभापतींचे मुख्याधिकारी शामकांत जाधव यांनी अभिनंदन केले. प्रतिनिधी | येवला नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांवर सदस्यांचे नामनिर्देशन, समिती सभापतींची निवड तसेच स्थायी समितीची गठिती करण्यासाठी मंगळवारी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. सभेस मुख्याधिकारी तुषार आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते दीपक लोणारी, शिवसेना शिंदे गटाचे गटनेते गणेश शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे गटनेते डॉ. संकेत शिंदे उपस्थित होते. सभेदरम्यान नगरपरिषदेच्या प्रशासन व शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सर्व विषय समित्यांची रचना करण्यात आली. सर्व समित्यांचे सभापती व सदस्यांची निवड एकमताने व अविरोध करण्यात आली. नगरपरिषदेची महत्त्वाची निर्णयप्रक्रिया राबविणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांची एकमताने निवड करण्यात आली. विविध विषय समित्यांवर प्रवीण बनकर, दीपक लोणारी, जावेद मोमीन, अमजद शेख, गणेश शिंदे, तृप्ती राजपूत, एजाज शेख, नसमुसर अन्सारी, जयाबाई जाधव, पद्माताई शिंदे, समीर समदडिया, कुणाल परदेशी, मीनाक्षी अलगट, सुरय्या मोमीन, छाया क्षीरसागर, महेश काबरा, लक्ष्मी साबळे, लक्ष्मीबाई जावळे, प्रवीणबानो शेख, अरबाज अन्सारी, संकेत शिंदे आदींची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या समिती रचनेमुळे शहरातील विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. प्रतिनिधी | सटाणा नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची निवड मंगळवारी (दि. ३) करण्यात आली. नगरपरिषद सभागृहात तहसीलदार कैलास चावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. नगरपरिषद प्रशासनाच्या कामकाजाला गती देण्यासाठी या समित्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. स्थायी समिती - सभापती : नगराध्यक्ष सागर हिरे, सदस्य : काशीनाथ देशमुख, रूपाली पाटील, राजेश शिंदे, सईद शेख, विद्या कसबे. सार्वजनिक बांधकाम समिती - सभापती : काशीनाथ देशमुख, सदस्य : पृथ्वीराज पाटील, किरण देवरे, स्वाती नावंदर, योगिता खरोटे. स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती - सभापती : रूपाली पाटील, सदस्य : बाळू शेवरे, काका सोळसे, स्नेहल पाटील, दत्तराज छाजेड. नियोजन आणि विकास समिती - सभापती : राजेश शिंदे, सदस्य : वंदना कवडे, खान जुबेदाबी गफ्फार खान, दीपक पांडव, राखी जाधव. पाणी पुरवठा आणि जलनिःस्सारण समिती- सभापती : सईद रशीद शेख, सदस्य : वाल्मीक टिळेकर, गायत्री शिंदे, स्वाती नावंदर, किरण देवरे. महिला व बालकल्याण- सभापती : विद्या कसबे, सदस्य : शोभा कासलीवाल, योगिता खरोटे, गायत्री शिंदे, कल्पना जगताप. स्थायी समिती- सभापती : हर्षदा पाटील, सदस्य : सुमित वाघ, मुल्ला रुफीक खलिल शाह, चेतन मोरे, सोनाली बैताडे, भूषण सोनवणे, कल्पना सोनवणे. सार्वजनिक बांधकाम समिती - सभापती : मुल्ला रुफीक खलिल शाह, सदस्य : रोशन सोनवणे, विलास दंडगव्हाळ, मनीषा पाकळे, चेतन रौदळ. शिक्षण, कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती- सभापती : चेतन मोरे, सदस्य : महेश सोनवणे, सीमा सोनवणे, सुनीता देवरे, मनीषा पाकळे. स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती- सभापती : सोनाली बैताडे, सदस्य : अनिल पाकळे, हर्षवर्धन सोनवणे, लताबाई बच्छाव, संगीता सोनवणे. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती- सभापती : भूषण सोनवणे, सदस्य : मंगेश खैरनार, राहुल पाटील, अलका बारसे, शेख हुमेरा यासीर. नियोजन व विकास समिती - सभापती : सुमित वाघ, सदस्य : हर्षवर्धन सोनवणे, सुनीता देवरे, प्रतिभा खैरनार, महेश सोनवणे. महिला व बालकल्याण समिती- सभापती : कल्पना सोनवणे, उपसभापती : तनुजा नांद्रे, सदस्य : हुमेरा शेख, मनीषा पवार, सुनीता देवरे. स्थायी समिती व विषय समित्यांचे सभापती व सदस्य नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांचे नवनिर्वाचित सभापती व सदस्य असे स्थायी समिती व विषय समितीचे सभापती सार्वजनिक बांधकाम समिती : शंकर मांजरे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती : चैताली शिंदे, महिला व बालकल्याण समिती : शीतल शिंदे, स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती : पारुल गुजराती, नियोजन व विकास समिती : पुष्पा गायकवाड, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती : शेख वकील, स्थायी समिती : राजेंद्र लोणारी स्थायी समितीतील नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य स्थायी समिती - सभापती : नगराध्यक्ष योगेश पाटील, सदस्य : मुकुंद एळींजे, आमिन पटेल, पूजा साबळे, डॉ. सुहास जाधव, विशाल आहिरे, पूजा लालसरे, नामनिर्देशित सदस्य : महेंद्र शिरसाठ, अमजद रशीदखाँ पठाण, रेश्मा पगारे
लासलगाव–विंचूर रस्त्याच्या प्रस्तावित चौपदरीकरणाच्या कामात रस्त्याची उंची वाढल्यास पावसाळ्यात शहरातील अनेक दुकानांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून, ही अडचण दूर करण्यासाठी काम सुरू होण्यापूर्वीच सर्वपक्षीय शिष्टमंडळ मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याचा निर्णय सोमवारी (दि. २) झालेल्या बैठकीत घेतला. चौपदरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वपक्षीय नेते, व्यापारी व गाळेधारकांची बैठक भगरीबाबा मंदिर येथे पार पडली. या बैठकीस माजी आमदार कल्याणराव पाटील, बाजार समिती सभापती डी. के. जगताप, सुवर्णा जगताप, सरपंच योगिता पाटील, उद्योजक संतोष पलोड, संजय पाटील, सचिन होळकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सध्या चौपदरीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र रस्त्याची अंतिम रुंदी, मध्यभागी दुभाजक असणार की नाही, तसेच रस्त्याची पातळी किती उंचावली जाणार याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. रस्त्याची उंची वाढल्यास पावसाळ्यात पाणी दुकानांत शिरून मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे दर्जेदार चौपदरीकरण व्हावे, मात्र रस्त्याची पातळी वाढवू नये, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली. यासंदर्भात येत्या आठवड्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन मागण्या मांडणार आहे. तसेच येवला प्रमाणे लासलगाव येथेही नियमित आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या बैठकीस प्रवीण कदम, अनिल वाघ, डॉ. कैलास पाटील, राजेंद्र चाफेकर, संदीप उगले, राजेंद्र कराड, गोकुळ पाटील, प्रमोद पाटील, दिलीप पानगव्हाणे आदी उपस्थित होते. बैठकीस ठेकेदार आणि अधिकारी अनुपस्थित लासलगाव–विंचूर रस्ता चौपदरीकरणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी परमपूज्य भगरी बाबा मंदिरात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. रस्ता रुंदीकरणामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित या बैठकीस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र संबंधित विभागाचा ठेकेदार अथवा बांधकाम विभागाचा एकही अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेत ‘एसएनजेबी फेस्टीवल-२०२६’ उत्साहात साजरा झाला . संस्कृती आणि कलेचा सुंदर मिलाफ ठरलेल्या या कार्यक्रमात इंडियन आयडॉल फेम प्रसिद्ध गायिका रागिणी शिंदे हिच्या सुमधुर गीतांनी आणि संस्थेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बहारदार सादरीकरणांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात सलग नवव्या वर्षी ‘एसएनजेबी फेस्टीवल’चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मंगल नवकार मंत्राने झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इंडियन आयडॉल टॉप-५ मधील विजेती रागिणी शिंदे व तिचा परिवार उपस्थित होता. तसेच चांदवडचे नगराध्यक्ष वैभव बागूल, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, मालेगाव येथील न्यायमूर्ती धपाटे, न्यायमूर्ती लटके, न्यायमूर्ती खराडे, संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, सचिव जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा आदी उपस्थित होते. यावर्षीचा ‘एसएनजेबी फेस्टीवल’ संस्थेच्या विविध शैक्षणिक शाखांतील शिक्षक-शिक्षकेतर सेवकांसाठी विशेषतः आयोजित करण्यात आला होता. उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या सहभागी कलाकारांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. सोनतारा भन्साळी ट्रस्ट, कोपरगाव आणि सुमल इंडिया, नाशिक यांच्या वतीने उत्कृष्ट कार्यक्रमांसाठी अनुक्रमे रुपये ५००१, २१००, ११०० आणि ५०१ अशी रोख बक्षिसे प्रदान केली . प्रास्ताविक झुंबरलाल भंडारी यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. डॉ. मुकेश पारेवाल यांनी केले, तर आभार डॉ. आकाश जैन यांनी मानले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पी. पी. गाळणकर, डॉ. गोटन जैन, सर्व विभागांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या फेस्टीवलमध्ये गीतगायन, समूह नृत्य, समूहगायन, मिमिक्री अशा विविध प्रकारातील एकूण १७ दर्जेदार आणि लक्षवेधी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. प्रत्येक सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळवली. प्रमुख अतिथी रागिणी शिंदे हिने आपल्या सादरीकरणातून हिंदी व मराठीतील १२ निवडक गाणी सादर करत कार्यक्रमाला विशेष उंची दिली. तिच्या प्रत्येक गीताला टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद मिळाला.
जोशी कुटुंबाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
खंडाळा गावचे पहिले सरपंच कै. एकनाथराव जोशी यांच्या स्मरणार्थ डॉ. अरुण जोशी यांच्या वतीने शाळेच्या नावे एफडी काढण्यात आली आहे. या एफडीवर मिळणाऱ्या व्याजातून गेल्या पाच वर्षांपासून दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना आजीवन बक्षिसे दिली जातात. मार्च २०२५ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत खंडाळा केंद्रात श्रेया कमलेश पवार हिला प्रथम क्रमांक मिळाला. तिला ४०१ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. प्राची नवनाथ वेळंजकर हिला द्वितीय क्रमांकासाठी ३०१ रुपये, तर ईश्वरी ज्ञानेश्वर बहाळस्कर हिला तृतीय क्रमांकासाठी १०१ रुपयांचे बक्षीस मिळाले. बक्षीस वितरण सोहळ्यात प्रशालेचे मुख्याध्यापक अल्लाउद्दीन शेख, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष एस. एस. बागुल, उपाध्यक्ष शफिक शेख, मेजर मिलिंद बागुल, केंद्रप्रमुख बबनराव तगरे, मुख्याध्यापक मनोज गव्हाणे, मुख्याध्यापक सुनिल प्रधान आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी सुरेश बर्डे, ईश्वर खेडकर, कल्पना गवारे, मनीषा कुमावत, रेखा भालेकर, आसाराम जाधव, गोविंद त्रिभुवन, ज्ञानेश्वर बहाळस्कर, अशोक दारवंटे, विक्रम पठारे, भास्कर घायवट, जोशना बकाल आणि विद्यार्थी उपस्थित होते. गेल्या पाच वर्षांपासून जोशी कुटुंबाकडून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराची परंपरा आजही सुरू आहे. या उपक्रमाची परिसरात चर्चा आहे.
पैठण जायकवाडी धरणात सध्या ९५ टक्के पाणीसाठा आहे. धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून मागील दीड महिन्यापासून रब्बी हंगामासाठी पाणी सुरू आहे. त्यामुळे गहू व उसाचे क्षेत्र वाढले आहे. उन्हाळ्यादरम्यान आणखी एक पाणी पाळी रब्बीसाठी देण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर सिंचन क्षेत्राला फायदा होत आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली. मागील दीड महिन्यापासून कालव्यात पाणी सोडल्याने विहिरींमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. एक पाणीपाळी २१ दिवस चालते. अतिवृष्टीमुळे यंदा खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची आस आता रब्बीच्या पिकावर आहे. रब्बीचा पेरा वाढला आहे. सध्या कालव्या लगत गव्हाच्या क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. उसाची लागवड वाढली असल्याचे तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी सांगितले. पैठण । डाव्या कालव्यातून सध्या सुरू असलेले पाणी. छाया : रमेश शेळके. तीन पाणीपाळी सोडण्याचे प्रशासनाचे आहे नियोजन विहिरींची पातळी वाढणार उन्हाळ्यातही मुबलक पाणी द्यावे : शेतकरी कातपूरचे शेतकरी दीपक मोरे यांनी सांगितले की, जायकवाडी धरणातून यंदा मुबलक पाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांत आनंद आहे. या पाण्यामुळे आमचे पिक दमदार आले आहेत. उन्हाळ्यात देखील मुबलक पाणी देण्यात यावे. धरणातून ३०० क्युसेकने पाणी सुरू जायकवाडी धरणाचा डावा कालवा २०८ किलोमीटर, तर उजवा कालवा १३२ किलोमीटर लांबीचा असून मराठवाड्यातील शेतीसाठी हा पाणीस्रोत जीवनवाहिनी ठरत आहे, सध्या दोन्ही कालव्यातून ३०० क्युसेकने पाणी सुरू आहे. प्रशांत संत, अभियंता पाटबंधारे विभाग सध्या जायकवाडीच्या दोन्ही कालव्यातून पाणी सोडले जात आहे, आणखी एक पाणी पाळी रब्बीसाठी असणार आहे व उन्हाळ्यात एक पाणी पाळी देण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून या पाण्याचा योग्य वापर करावा. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. डाव्या कालव्यातून १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर, तर उजव्या कालव्यातून ४१ हजार ६८२ हेक्टर, असे एकूण १ लाख ८३ हजार ३२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. यंदा रब्बी हंगामासाठी तीन पाणीपाळी सोडण्याचे नियोजन असून सध्या दुसरी पाळी सुरू आहे. यामुळे रब्बी पिके दमदार आली आहेत.
फर्दापूरजवळील जीप आणि दुचाकी अपघात, एकाचा मृत्यू:जळगाव-संभाजीनगर महामार्गावर घडली घटना
जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील फर्दापूरजवळील सोयगाव फाट्यावर मोटारसायकल व क्रूझर जीप यांच्यात भीषण अपघात होऊन यात पळसखेडा येथील सबदर मन्सूर तडवी (५२, रा. पळसखेडा, ता. सोयगाव) यांचा मृत्यू झाला आहे. सबदर तडवी हे सकाळी फर्दापूरकडून पळसखेड्याच्या दिशेने जात असताना, महामार्गावरून सोयगावकडे वळण घेणाऱ्या क्रूझर जीपसोबत त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. यात ते गंभीर जखमी झाले. दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात धडक जोरदार झाल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. सबदर यांच्या डोक्याला जबर मार लागला. यामुळे ते जागेवरच पडून होते. घटनास्थळी उपस्थित राजू नामदेव साळवे यांनी त्यांना जखमी अवस्थेत तातडीने ग्रामीण रुग्णालय, सोयगाव येथे दाखल केले. डॉक्टरांनी तपासुन त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद फर्दापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक निलेश लोखंडे करीत आहेत.
गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथे श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर प्रांगणात गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या शिवकालीन युद्धकला व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचा समारोप प्रात्यक्षिकाच्या प्रदर्शनाने झाला. यात विविध वयोगटातील १५० मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुषमा विष्णू मुळे, सरपंच ग्रा. पं. सावखेडा, होत्या. संदीप शिंगाडे, पोलिस पाटील सावखेडा; सुरेश विधाटे, मुख्याध्यापक ग्रीनलँड ग्लोबल स्कूल; राजू रामभाऊ मुळे, सहशिक्षक नेहरू विद्यालय सावखेडा; व माता-पालक आदींची उपस्थिती होती. सावखेडा येथील नृसिंह युवा मंच यांच्या संकल्पनेतून मुला-मुलींना स्वसंरक्षणाच्या दृष्टिकोनातून सक्षम करण्यासाठी १९ जानेवारीला हे प्रशिक्षण सुरू झाले. या शिवकालीन युद्धकला व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरात १५० मुला-मुलींनी सहभाग नोंदवला. यात सकाळी ५ ते ७ व सायंकाळी ५ ते ९ या वेळेत हे प्रशिक्षण देण्यात आले होते.
खुलताबाद आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज खुलताबाद तालुक्याचा दौरा केला. त्यांनी निवडणूकपूर्व तयारीचा सखोल आढावा घेतला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी पूर्ण सज्ज राहावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालय, खुलताबाद येथील निवडणूक विभागाची पाहणी केली. त्यांनी मतदार याद्या, मतदान केंद्रांवरील सुविधा, संवेदनशील मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था तसेच आचारसंहिता अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा केली. मतदार याद्यांच्या संदर्भात बोलताना जिल्हाधिकारी स्वामी यांनी मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम वेळेत व अचूक पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. कोणताही पात्र मतदार नाव नोंदणीपासून वंचित राहू नये, याची विशेष दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मतदान केंद्रांवरील किमान आवश्यक सुविधांवर भर देताना त्यांनी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी उतार मार्ग, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा तसेच स्वच्छतागृहांची उपलब्धता प्रत्यक्ष तपासून त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यानंतर जिल्हाधिकारी श्री. दिलीप स्वामी यांनी कैलास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे भेट दिली. त्यांनी मतपेटी व निवडणूक साहित्य साठवण कक्ष, साहित्य कक्ष तसेच संगणक कक्षाची पाहणी केली. निवडणूक साहित्याची सुरक्षितता, संगणकीय व्यवस्थेची तयारी व साठवण कक्षाची क्षमता समाधानकारक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या आढावा बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गुट्टे, प्रकाश नाईक यांच्यासह निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई तालुक्यातील संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेऊन त्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, बंद पथकांद्वारे निरीक्षण तसेच सतत नजर ठेवण्याचे नियोजन करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. निवडणूक आचारसंहिता प्रभावीपणे राबविण्यासाठी भ्रमण पथके व स्थिर नियंत्रण पथकांनी आतापासूनच सतर्क राहून काम करावे. आचारसंहितेचा कोणताही भंग होणार नाही, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हाधिकारी यांनी खुलताबादेत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. निवडणूक कामकाजात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जबाबदारी नीट पार न पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. प्रत्येकाने आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
महापौरपदाची निवडणूक लढण्याचा निर्णय ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमिनने (एमआयएम) घेतला आहे. भाजपच्या विरोधात सर्वजण एकत्र येत असतील तर शिंदेसेनेलाही पाठिंबा देण्यास तयार आहोत, असे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. मात्र, एमआयएमचा पाठिंबा घेणार नाही आणि देणारही नाही, अशी भूमिका शिवसेनेचे नेते, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घेतली आहे. भाजपचे ५७ नगरसेवक आहेत. बहुमतासाठी केवळ एका जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडीने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. १८ नगरसेवकांविरुद्ध अपात्रतेची तक्रार, त्यात १६ ‘एमआयएम’चे छत्रपती संभाजीनगर| सरकारी जागेवर अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम, दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याच्या १८ नगरसेवकांविरोधात तक्रारी मनपा प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक १६ तक्रारी या एमआयएमच्या विरोधात असून शिवसेना-भाजपच्या प्रत्येकी एका नगरसेवकाविरोधात आहेत. तीन नगरसेवकांनी सरकारी जागेवर अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम केल्याच्या, तर एकाने खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार मनपाच्या निवडणूक विभागाकडे आली आहे. शपथपत्रात कमी संपत्ती दाखवल्याच्याही तक्रारी आहेत. १० पेक्षा अधिक नगरसेवकांविरोधात दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याच्या तक्रारी मनपाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येतो. त्यावर विभागीय आयुक्त निर्णय घेतात. शहराला धर्मनिरपेक्ष चेहरा हवा शहरात धर्मनिरपेक्ष महापौर होणे गरजेचे आहे. पाठिंबा दिल्यास मी लढण्यास तयार आहे. शिंदेसेनेला एमआयएमची अडचण असल्यास मी नेतृत्व करण्यास तयार आहे. - नवीन ओबेराय, नगरसेवक, राष्ट्रवादी (शरद पवार) मुंगेरीलाल के हसीन सपने शिवसेनेला सोबत घेत एमआयएम संभाजीनगरचा महापौर बनवणार ही बाब म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहे. असे स्वप्न रंगवणाऱ्याचे हसू येते. - संजय केणेकर, प्रदेश सरचिटणीस, भाजप आम्ही एमआयएमविरुद्ध लढलो आम्ही एमआयएमच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. त्यामुळे आम्ही एमआयएमचा पाठिंबा घेणार नाही, तसेच त्यांनी आम्हाला दिला तरी आम्ही घेणार नाही. - संजय शिरसाट, पालकमंत्री, शिंदेसेना राष्ट्रवादी, वंचितला पाठिंबा देऊ महापौरपदासाठी आकडे जुळत नाहीत. मात्र भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा, वंचित बहुजन आघाडीचा महापौर होत असेल तर पाठिंबा देऊ. - अंबादास दानवे, नेते, उबाठा भाजपविरोधात आमची चाचपणी सुरू भाजपच्या विरोधात ५८ लोक आहेत. आम्ही आमची चाचपणी सुरू केली आहे. भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही शिवसेनेला पाठिंबा द्यायलाही तयार आहोत. - इम्तियाज जलील, प्रदेशाध्यक्ष, एमआयएम तिसऱ्या आघाडीसाठी काँग्रेस सकारात्मक भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी होत असेल तर काँग्रेसचा त्याच्या पाठिंब्यासाठी सकारात्मक आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर नेत्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. - युसूफ शेख, शहराध्यक्ष
महापौरपदाच्या नावावर भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीत एकमत झाले नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही तोडगा निघाला नाही. महापौरपदाचा चेंडू आता पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात गेला असून मुंबई येथूनच उमेदवाराचे नाव बंद लिफाफ्यातून पाठवले जाईल. पक्षाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महापौरांबरोबरच गटनेता, उपमहापौर या पदांसाठीच्या नावांवर चर्चा झाली. निवडलेली नावे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी प्रदेशाकडे अंतिम निर्णयासाठी पाठवली आहेत. मनपा निवडणुकीत भाजपचे 57 नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यांना बहुमतासाठी एका नगरसेवकाची गरज आहे. भाजपच्या बैठकीला कॅबिनेट मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, संघटन मंत्री संजय कोडगे, आमदार संजय केणेकर, जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, बापू घडमोडे, शिरीष बोराळकर, बसवराज मंगरूळे हे उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीतही एकमत झाले नसल्याने 8 उमेदवारांची नावे भाजपच्या कोअर कमिटीने प्रदेश समितीकडे पाठवली आहेत. 7 ते 8 नावे पाठवली प्रदेश समितीकडे महापौर, उपमहापौर, तसेच गटनेते पदासाठी 7 ते 8 नावे पाठवण्यात आली आहेत. यासंबंधी प्रदेश स्तरावरून निर्णय होईल. - अतुल सावे, बहुजन विकास मंत्री दिग्गज नेत्यांमुळे रस्सीखेच छत्रपती संभाजीनगर शहरात मंत्री, खासदार आणि आमदार हे दिग्गज नेते आहेत. त्याशिवाय जालना लोकसभा मतदारसंघातील काही भागही शहरात आहे. तेथील आजी-माजी लोकप्रतिनिधींचा मनपामध्ये प्रभाव आहे. या नेत्यांचे समर्थक महापालिका निवडणुकीत विजयी झाले आहेत. आपापल्या समर्थकाची वर्णी महापौरपदी लागावी यासाठी नेते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित होत नसल्याचे मानले जाते.
अकोला येथील गांधी रोडवरील सिटी कोतवाली पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या खंडेलवाल ज्वेलर्स शेजारील असलेल्या ‘परी बिंदी घर'' नामक सौंदर्य प्रसाधन दुकानाचा संचालक व त्याच्या साथीदारांकडून डाबकीरोड भागातील एका विवाहितेला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच महिलेला धर्मांतर करण्याचा दबाव आणल्याचा प्रकारही उघडकीस आला. याबाबत सिटी कोतवाली पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी रुग्णालयात उपचारार्थ भरती झाल्याने त्याची अटक तूर्त टळली आहे. ‘परी बिंदी घर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कॉस्मेटिक दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना आमिष दाखवून जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि मानसिक शोषण केल्याचा गंभीर आरोपसमोर आला आहे. डाबकी रोड परिसरातील 29 वर्षीय विवाहितेच्या फिर्यादीनुसार, दुकान मालक रहेमान उर्फ मोहंमद मुस्तफा मोहमंज सलीम तेली, त्याचा साथीदार चंदू राजू वानखेडे, इम्रान गॅरेजवाला आणखी एक जण अशा चौघांविरुद्ध 3 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला आहे. दुकानमालक रहेमान उर्फ मोहंमद मुस्तफा हा प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याने तो वगळता इतर तिघांना सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली. फिर्यादी महिलेवर ट्रान्स्पोर्ट गल्लीतआरोपीचा मित्र सुभान यांच्या टू बीएचके फ्लॅटमध्ये हा अत्याचाराचा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. आणखी काही पीडित महिलांनी पुढे येण्याची शक्यता या प्रकरणात आरोपी आणि फिर्यादीचा मोबाइल डेटा, कॉल रेकॉर्ड्स,सीसीटीव्ही फुटेज आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारे सखोल तपास केला जात आहे. आणखी काही पीडित महिला पुढे येण्याची शक्यता आहे. - संजय गवई, पोलिस निरीक्षक, सिटी कोतवाली ठाणे. ओळख वाढवून जाळ्यात ओढायचा माहितीनुसार, आरोपी सुरुवातीला दुकानात आलेल्या महिलांशी मैत्रीपूर्ण संवाद साधत. विश्वास संपादन केल्यानंतर ‘नवीन कॉस्मेटिक साहित्य आले आहे’ किंवा ‘ऑर्डर पाठवायची आहे’ या बहाण्याने महिलांचे मोबाइल नंबर घ्यायचा. त्यानंतर सतत फोन, मेसेजकरून त्यांना पुन्हा दुकानात येण्यास प्रवृत्त केले जात होते. काही वेळा दुकानात इतर कोणी नसल्याची संधीसाधून असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. काही महिलांनी संशय येताच दुकानात जाणे टाळले, मात्र आधी दिलेल्या मोबाइल नंबरच्या आधारे त्यांच्यावर मानसिक दबाव टाकायचा. गुपचूप केलेले चित्रीकरण व्हायरल करायची धमकी महिलांना दुकानात बोलावून गुपचूप व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. हे व्हिडिओ दाखवून ‘सोशल मीडियावर व्हायरल करू’ अशी धमकी देत धाक दाखवण्यात आला. काही प्रकरणांमध्ये पीडित महिलांना प्रचंड मानसिक तणावाखाली ठेवून त्यांच्या इच्छेविरुद्ध कृत्ये करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. अशाप्रकारे व्हिडिओचा वापर करून महिलांचे सातत्याने शोषण करण्यात येत होते, असे तक्रारीत म्हटले आहे. दिव्य मराठी इनसाइड धर्मांतरण केले तरच व्हिडिओ डिलीट करणार, आरोपी टाकायचे दबाव ‘धर्मांतरण केले तरच अश्लील व्हिडिओ डिलीट केले जातील’ अशी धमकी दिल्याचा आरोप या महिलेने केले आहेत. धर्मांतरासाठी दबाव टाकून इतर महिलांना फ्लॅटवर बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या कृत्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून 2023 पासून ब्लॅकमेलिंग करत शोषण सुरू ठेवले. तसेच थोडीथो़डी करुन 5 लाखांची रक्कमही मागितली, असा आरोप केला आहे.‘सेक्स स्कँडल’चा हा प्रकार असल्याचा प्राथमिक संशय वर्तवला जात आहे.
महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत सोलापूर केंद्रातून रंगसंवाद संस्थेच्या ‘हिबाकुशा’ या नाटकाने प्रथम क्रमांक मिळविला. बहुजन हिताय बहुजन सुखाय या संस्थेच्या ‘झाले मोकळे आकाश’ या नाटकाने द्वितीय तर आकार सोशल फाउंडेशनच्या होत्या काही चिमण्या या नाटकाने तृतीय क्रमांक मिळविला. समर्पित फाऊंडेशनच्या वसा या नाटकाला चतुर्थ क्रमांक जाहीर करण्यात आला. सोलापूर केंद्रातून या चार नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. बालनाट्य स्पर्धेचा निकाल : दिग्दर्शन - प्रथम : मिहीका शेंडगे (हिबाकुशा), द्वितीय : संदीप उडाणशिव (झाले मोकळे आकाश), तृतीय : किरण लोंढे (बालन)प्रकाश योजना - प्रथम : प्रदीप राजपूत (होत्या काही चिमण्या), द्वितीय : शशिकांत (हिबाकुशा), तृतीय : उमेश बटाणे (झाले मोकळे आकाश)नेपथ्य - प्रथम : तारासिंग मरोड (होत्या काही चिमण्या), द्वितीय : मळसिद्ध देशमुख (हिबाकुशा), तृतीय : संदिप जाधव (झाले मोकळे आकाश)रंगभूषा - प्रथम : विजयालक्ष्मी श्रावण (होत्या काही चिमण्या), द्वितीय : शिवशंकर स्वामी (भेट), तृतीय : रमेश श्रावण (हिबाकुशा)वेशभूषा - प्रथम : अंजली मित्रगोत्री (हिबाकुशा), द्वितीय : कुणालसिंह चौहान (होत्या काही चिमण्या), तृतीय : पूजा चाकोते (ताटी उघडा)संगीत दिग्दर्शन - प्रथम : श्रीकृष्ण जोशी (हिबाकुशा), द्वितीय : रोहित लिगाडे (होत्या काही चिमण्या), तृतीय : विश्वजीत माने (ताटी उघडा) उत्कृष्ट अभिनय - रौप्य पदक : सम्राट जौंजट (झाले मोकळे आकाश) व आरोही शेळके (भेट)अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे - आराध्या डोळसे (झाले मोकळे आकाश), श्रावणी लोखंडे (बालन), रुद्राक्षी इंगळे (म्याडम), वेदिका कांबळे (होत्या काही चिमण्या), अनन्या पिंपळेकर (हिबाकुशा), विरसिंह ठाकूर (सदाफुली रंगीत झाली), अलोक शेळके (भेट), ओंकार कांबळे (गोलूमोलू), अथर्व भोसले (वल्ली), हर्षवर्धन गोतसुर्वे (मुके शब्द). आदींनी कलाकारांनी बालनाट्य स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.सोलापूर. राज्य बालनाट्य स्पर्धेत सोलापूर केंद्रातून प्रथम आलेल्या हिबाकुशा या नाटकातील एक प्रसंग एकूण ४३ बालनाट्यातून विजेते संघ अंतिम फेरीत सोलापूर केंद्रासाठी शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे १६ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा झाली. या स्पर्धेत एकूण ४३ बालनाट्य सादर झाले. विविध संस्थानी यात सहभाग घेतला परीक्षक म्हणून हेमंत गव्हाणे, देवेंद्र भिडे, अमृता जोगदेव यांनी काम पाहिले.
महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील कृषी उत्पादन, उत्पादकता आणि जागतिक बाजारपेठेतील निर्यात क्षमता वाढवण्यासाठी राज्य सरकारचे एक उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ थेट अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. विपणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार जितेंद्रसिंह रावल यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा पार पडणार असून, याद्वारे महाराष्ट्रातील शेतीला जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान मिळवून देण्याचा सरकारचा मानस आहे. येत्या ९ ते १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान अमेरिकेत होणाऱ्या जगप्रसिद्ध ‘नॅशनल फार्म मशिनरी शो’ २०२६ ला हे प्रतिनिधीमंडळ भेट देणार आहे. या प्रदर्शनात जगातील सर्वात प्रगत कृषी यंत्रसामग्री आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाचे प्रदर्शन भरवले जाते. प्रिसिजन फार्मिंग (अचूक शेती), आधुनिक कापणी यंत्रे आणि मानवी श्रमाचा वापर कमी करणाऱ्या रोबोटिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीनुसार कसे राबवता येईल, याचा आराखडा या दौऱ्यात तयार केला जाणार आहे. याचा थेट फायदा राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याला तंत्रज्ञान स्वरूपात देण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्याला सक्षम करणे हेच ध्येय अमेरिकेतील प्रगत तंत्रज्ञान आणि बाजारपेठ यांचा समन्वय साधून आपल्या शेतकऱ्याला जागतिक स्पर्धेत सक्षम करणे हेच मुख्य ध्येय आहे. अमेरिकेतील ‘नॅशनल फार्म मशिनरी शो’ द्वारे प्रिसिजन फार्मिंग आणि स्वयंचलित यंत्रसामग्री महाराष्ट्रात आणून मजुरांची टंचाई व वाढता खर्च यावर मात करण्याचा प्रयत्न आहे. केवळ उत्पादनावर लक्ष न देता, वॉशिंग्टन डी.सी. मधील बैठकांमधून महाराष्ट्रातील शेतीमालासाठी अमेरिकन बाजारपेठेची दारे उघडणे हा मोठा धोरणात्मक बदल आहे. काढणीपश्चात प्रक्रिया आणि प्रगत लॉजिस्टिक्सवर लक्ष केंद्रित केल्यामुळे शेतीमालाचे नुकसान कमी होऊन शेतकऱ्यांच्या हातात अधिक नफा पडेल. या संपूर्ण दौऱ्याचा खर्च महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ करणार असून हा दौरा केवळ यंत्रसामग्री पाहण्यापुरता मर्यादित नसून, महाराष्ट्रातील शेतीमालाला हक्काची जागतिक बाजारपेठ मिळवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश असून वॉशिंग्टन डी.सी. येथे होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकांमध्ये महाराष्ट्रातील फळे, भाजीपाला आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या निर्यातीसाठी ‘रोडमॅप’ तयार केला जाईल. यामुळे थेट अमेरिकेच्या बाजारपेठेत महाराष्ट्राचा ब्रँड पोहोचण्यास मदत मिळणार आहे. कृषी क्षेत्रात विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न स्वयंचलित यंत्रसामग्री आणि प्रिसिजन शेतीचा अभ्यास, काढणीपश्चात प्रक्रिया, जागतिक दर्जाचे पॅकेजिंग आणि लॉजिस्टिक्स सुधारण्यावर भर. कृषी क्षेत्रात विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न.
मसाप निवडणुकीत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाचा नकार:मतपत्रिका स्पीड पोस्टाने पाठवण्याचे निर्देश
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम धर्मादाय उपायुक्त पुणे यांच्याकडील सुनावणी व बदल अर्जासंदर्भातील हरकतीवर निकाल लागेपर्यंत सुरू ठेवू नये, अशी मागणी करणारी याचिका राजकुमार धुरगुडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने हस्तक्षेपास नकार देत याचिका फेटाळून लावली. मतपत्रिका साध्या पोस्टाने न पाठवता त्या स्पीड पोस्टाने पाठवाव्यात, असे निर्देश न्यायालयाने दिले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विरुद्ध अर्ज दाखल करून संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया चालू करू नये अशी मागणी केलेली होती. साहित्य परिषदेचे आजीव सभासद राजकुमार भानुदास धुरगुडे यांचे सभासदत्व संस्थेची बदनामी केल्याचा ठपका ठेवत कार्यकारी मंडळाने ७ डिसेंबर २०२५ च्या सभेत कायमस्वरूपी रद्दीचा निर्णय घेतला .त्या विरोधात धुरगुडे यांनी दाखल केलेल्या अर्जाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे असा युक्तिवाद ॲड. निखिलेश पोटे यांनी मसापच्यावतीने करत याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली. त्यावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने याचिका निकालात काढताना निवडणुकीच्या कार्यक्रमात कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार दिला. उद्यापासून मतपत्रिका स्पीड पोस्टाने पाठविल्या जाणार ५ फेब्रुवारीपासून १६६०७ मतदारांना मतपत्रिका स्पीड पोस्टाद्वारे पाठवण्यात येणार आहेत, असे परिषदेच्या वतीने सांगण्यात आले. त्यावर न्यायमूर्तीनी तशी मुभा दिली. मतपत्रिका १३ मार्च पर्यंत परत येऊन १५ मार्च रोजी मतमोजणी होईल, असे आदेशात नमूद केले. ही माहिती कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.
सक्षमीकरणातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी:मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन
राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महिला शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘गोदरेज ॲग्रोव्हेट’ आणि ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ (उमेद) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. ९ जिल्ह्यांतील ५ हजार महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर केले जाणार आहे. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्याच्या विकासात महिला शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक आहे. करार केवळ तांत्रिक मदत नसून, ग्रामीण भागात लैंगिक समानता व शाश्वत कृषी पद्धती रुजवण्यासाठी घेतलेला संकल्प आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे कापूस उत्पादक पट्ट्यातील महिलांची उत्पादकता वाढून त्यांचे जीवनमान उंचावेल. ९ जिल्हे, ५० हजार एकर क्षेत्रावर विस्तार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने एक निश्चित आराखडा तयार केला असून, त्याची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत: लाभार्थी गट: या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ५,००० हून अधिक महिला शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असून, १०० महिला स्वयंसहायता गटांना (एसएचजी) याद्वारे संघटित केले जाणार आहे. क्षेत्रीय व्याप्ती: हा प्रकल्प एकूण ५०,००० एकर शेती क्षेत्रावर राबविण्यात येणार आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर शाश्वत शेतीचा प्रसार होईल. निवडक ९ जिल्हे : प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील कापूस उत्पादक पट्ट्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, परभणी, नांदेड, बीड आणि जळगाव या ९ जिल्ह्यांचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. अजित पवारांच्या निधनानंतर या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी कुणाकडे जाणार, याची चर्चा सुरू झाली होती. त्याला या निर्णयाने पूर्णविराम मिळाला. बारामती लोकसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात येतो. त्यामुळे सुनेत्रा पवार त्या अर्थाने तेथीलही पालक असतील. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या विकासकामांचे प्रस्ताव सुनेत्रा पवारांच्या सहीनेच मंजूर होतील. एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवारांविरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत झाली होती. त्यात सुप्रिया विजयी झाल्या होत्या. त्यानंतर सुनेत्रा यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. लवकरच त्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. त्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांनी सुप्रिया सुळे या मूळ पवार घराण्याची लेक असून सूनबाई सुनेत्रा बाहेरची लेक असल्याचे म्हटले होते. पार्थ पवार खासदार होण्यास इच्छुक दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना होणारे शरद पवार यांनी आपला दौरा अचानक रद्द केला. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार सुनेत्रा पवारांच्या जागेवर राज्यसभा खासदार होण्यास इच्छुक आहेत. सुनेत्रा पवारांची खासदारपदाची मुदत जुलै २०२८ पर्यंत आहे. पार्थ यांना याच दोन वर्षांच्या कालावधीसाठी पाठवायचे की राज्यसभेच्या सहा वर्षांच्या पूर्ण टर्म असलेल्या जागेवर संधी द्यायची, यावर सध्या खलबतं सुरू आहेत. त्याविषयी सल्लामलतीसाठी शरद पवार दौरा रद्द करून मंगळवारी बारामतीत दाखल झाल्याची चर्चा आहे. सुनेत्रांना पूर्ण शक्ती, पण कदाचित अर्थ खाते नाही पुणे, बीडचे पालकमंत्रीपद देऊन भाजप सुनेत्रा पवारांना पूर्ण शक्ती देणार असल्याचे यातून स्पष्ट झाले. मात्र, पालकमंत्रीपद देऊ पण अर्थ खाते नाही, असाही संदेश असावा, असे राजकीय घडामोडीच्या जाणकारांचे म्हणणे आहे. ‘एमसीए’ सदस्य भरती, सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना झापले रोहित पवारांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत (एमसीए) ४०० आजीवन सदस्यांची नोंदणी केली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने रोहित यांना अक्षरश: झापले. “इतकी बेकायदेशीर कामे करण्याची हिंमत कशी होते? आता याचिका मागे घेता की ठोकू कडक ताशेरे?’ अशी विचारणा कोर्टाने केल्यावर रोहित यांनी लोटांगण घालत माघार घेतली. निवृत्त भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवने या प्रकरणी याचिका दाखल केली होती. विलीनीकरणाचा प्रस्तावच नाही- पटेल दिल्लीत मोदी, शाह यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही. अजित पवारांनी केवळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी समन्वयाची भूमिका मांडली होती. दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरण्याच्या बातम्या निव्वळ काल्पनिक आहेत. तसा कोणताही प्रस्ताव नाही. आमच्या पक्षाचा अध्यक्ष कोण असावा, विधिमंडळ गटनेता कोण असावा हे राज ठाकरेंनी का ठरवावे? सकाळी नऊच्या बुलेटिनमध्ये येऊन कुणीही आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही. १३ एप्रिल २०२४ लोकसभा प्रचारादरम्यान शरद पवारांनी ‘एक पवार घरचे आणि दुसरे बाहेरचे’ असे म्हटले होते. सुनेत्रांचे नाव न घेता त्या पवार घराण्यात ‘बाहेरची लेक’ आहेत, असा निर्देश केला. याविषयी सुनेत्रा काहीही बोलल्या नव्हत्या. त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते. दरम्यान, तीन वर्षांपूर्वीच्या पहाटेच्या शपथविधीप्रमाणे पुन्हा शरद पवार दगाफटका करणार नाहीत, याची १०००% हमी मोदी-शाहांना हवी. ती मिळाल्यावरच राष्ट्रवादी विलीनीकरणाचा निर्णय होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला २०१४ ते २०२६ या १२ वर्षांत कर हस्तांतरण आणि अनुदानरूपात ९.४९ लाख कोटी रुपये मिळाले. यामध्ये ५.८३ लाख कोटी रुपये कर हस्तांतरण तर ३.६६ लाख कोटी रुपये केंद्र अनुदानाचे आहेत. केंद्र-राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला ८९,८५५.८० कोटी रुपयांचा कर वाटा येणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २००९-१४ मध्ये वार्षिक सरासरी केवळ १,१७१ कोटी रुपये मिळत होते. २०२४-२५ मध्ये ही तरतूद १५,९४० कोटींवर पोहोचली. ही १३ पट वाढ आहे. राज्यात सध्या ८१,५८० कोटींचे ४१ रेल्वे प्रकल्प सुरू आहे. महाराष्ट्रासाठी विशेष तरतूद : एका नजरेत
सत्ताधा-यांनी मागील ९ वर्षांत काय केले ते सांगावे
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे आव्हान, उमेदवारांच्या प्रचारार्थ वलांडीत जाहीर सभा वलांडी : वार्ताहर निलंग्याच्या लोक प्रतिनिधींना मागील काही दिवसांपासून सकाळ, दुपार, संध्याकाळ माझीच आठवण होत आहे. या सत्ताधा-यांनी टीका टिपण्णीवर भाषणे न करता आपण मागील ९ वर्षांत काय केले, ते सांगावे. परंतु त्यांच्याकडे सांगायला काहीच नसल्याने केवळ टीका करण्यापलीकडे काहीच नाही. सामान्य माणसाकरिता […] The post सत्ताधा-यांनी मागील ९ वर्षांत काय केले ते सांगावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भ्रष्टाचाराचा कासरा आवळण्याची हीच योग्य वेळ
निलंगा : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात असताना जिल्ह्यात कोणतेही ठोस विकासकाम झाले नसून अनेक विकास योजना केवळ कागदावरच राबविण्यात आल्या. या योजनांमध्ये भाजप पदाधिकारी व त्यांच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, काँग्रेस नेते धिरज विलासराव देशमुख यांनी केला. निलंगा तालुक्यातील लांबोटा व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड येथील जिल्हा […] The post भ्रष्टाचाराचा कासरा आवळण्याची हीच योग्य वेळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शेतीच्या योजना थेट शेतक-यांपर्यंत पोहोचविणार
चाकूर : प्रतिनिधी ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच ग्रामविकासासाठी प्रयत्नशील राहणार, शेती विकास, आरोग्य, रस्ते आणि रोजगारासाठीचा अजेंडा तसेच थेट आश्वासन, गाव बदलण्यासाठी नियोजन करणार आणि तक्रारी नव्हे तर तोडगा काढणार, असे प्रतिपादन नागनाथ पाटील (एन.आर.) हे कॉर्नर बैठकांतून करीत आहेत. जानवळ गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असून, काँग्रेस आघाडीकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी […] The post शेतीच्या योजना थेट शेतक-यांपर्यंत पोहोचविणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सर्वांगीण विकासासाठी जि. प., पं. स. निवडणूक महत्वाची
रेणापूर : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या गावांच्या सर्वांगीण विकासाशी थेट संबंधित असतात मात्र या निवडणुकांमध्ये भाजपचे काही नेते द्वेषाचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी कामखेडा गटातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केला. लातूर जिल्हा परिषद काँग्रेस आघाडीच्या कामखेडा गटातील अधिकृत […] The post सर्वांगीण विकासासाठी जि. प., पं. स. निवडणूक महत्वाची appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माणसांसारखाच झाडांचाही वाढदिवस
लातूर : प्रतिनिधी झाडांशी केवळ नाते नाही तर जिव्हाळा निर्माण व्हावा, या उद्देशातून वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने हिप्परसोगा येथे झाडांचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दि. १ फेब्रुवारी रोजी झालेल्या या उपक्रमाने ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले. गतवर्षी लावलेल्या झाडांना फुगे बांधून, केक कापून आणि आनंदी वातावरणात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. […] The post माणसांसारखाच झाडांचाही वाढदिवस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पोलिस दलात अत्याधुनिक सर्व्हेलन्स वाहनांचा समावेश
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक व प्रभावीपणे राखण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या तांत्रिक क्षमतेत महत्त्वपूर्ण भर पडली असून, महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक, बिनतारी संदेश व वाहतूक (कम्युनिकेशन व मोटार ट्रान्सपोर्ट) यांच्या वतीने लातूर जिल्हा पोलीस दलास दोन अत्याधुनिक सर्व्हेलन्स व्हॅन प्राप्त झाल्या आहेत. या अत्याधुनिक सर्व्हेलन्स वाहनांचे उद्घाटन […] The post पोलिस दलात अत्याधुनिक सर्व्हेलन्स वाहनांचा समावेश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमानांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडिया आणि इंडिगो या दोन विमानांच्या पंखांची धडक झाली असून यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या घटनेने विमान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गर्दीच्या वेळी टॅक्सीवेवर घडली, ज्यात प्रवाशांनी भरलेल्या दोन लहान विमानांचा समावेश होता. विमानतळ सूत्रांनुसार, गर्दीच्या धावपट्टीवरून मार्गक्रमण करत असताना दोन्ही विमानांचे पंखांचे टोक एकमेकांना घासले गेले. यात पंखांचे किरकोळ नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अधिकची माहिती अशी की, यातील एअर इंडिया AI 2732 हे विमान मुंबईहून कोईम्बतूरसाठी उड्डाण करण्याच्या तयारीत होते. विमान प्रस्थानासाठी आपल्या गेटवरून ते पुढे जात होते. तर इंडिगो 6E791 हे विमान हैदराबादहून आले होते. सुरक्षित लँडिंगनंतर विमान आपल्या निर्धारित पार्किंग बेकडे जात होते. याच वेळी दोन्ही विमानांचे पंख एकमेकांना धडकले. डीजीसीएकडून चौकशीचे आदेश दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या घटनेची दखल घेतली असून, औपचारिक चौकशीचे आदेश दिले आहेत. दोन्ही विमान कंपन्यांनी नियामक प्राधिकरणांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे दुजोरा दिला आहे.
मतांचा बाजार मांडून शासकीय योजना हडप करणा-या मंडळींना जनतेने धडा शिकवावा
उदगीर : प्रतिनिधी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या स्थानिक लोकप्रतिनचे धोरण निवडणूक काळात मतांचा बाजार मांडून नंतर शासकीय योजना हडप करणे. या मंडळींना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे आयोजित […] The post मतांचा बाजार मांडून शासकीय योजना हडप करणा-या मंडळींना जनतेने धडा शिकवावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बालविवाह मुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांची सामूहिक शपथ
लातूर : प्रतिनिधी बालविवाह मुक्त भारत अभियान आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या अंतर्गत महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या आशा मोहिमेअंतर्गत लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लातूर येथील संत नामदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी […] The post बालविवाह मुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांची सामूहिक शपथ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औसा रोडवर भरदुपारी दागिन्यांची लूट
लातूर : आम्ही पोलीस आहोत, चार दिवस अंगावर सोन्याचे दागिने घालून फिरण्यास मनाई आहे. म्हणून दोघा तोतयांनी पोलीस असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून एका दांपत्याकडून सोन्याचे दागिने लुटल्याची घटना दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी औसा रोडवर घडली. पंचाक्षरी बाबय्या स्वामी वय ६६ वर्षे रा. शिवनगर लातूर व त्यांच्या पत्नीस औसा रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप, गंधर्व हॉटेल […] The post औसा रोडवर भरदुपारी दागिन्यांची लूट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अधिकारी वडिलाचा मुलानेच केला भोसकून खून
लातूर : येथील आयकर कार्यालयात अधिकारी असलेले कृष्णकुमार सन्मुखराव यांचा त्याच्या मुलानेच राहत्या घरी चाकु पोटात खुपसून खुन केला. ही घटना दि. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या घटनेने लातूरात खडबड उडाली. आयकर विभागातील अधिकारी कृष्णकुमार सन्मुखराव हे अहमदपूर तालुक्यातील मूळ रहिवाशी आहेत. त्यांनी लातूर शहरापासून जवळच असलेल्या खोपेगाव शिवारात प्लॉट घेवुन नुकतेच घर बांधले […] The post अधिकारी वडिलाचा मुलानेच केला भोसकून खून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
खरीप हंगामातील धानाचे थकीत चुकारे, बोनस आणि वीज जोडणी यांसारख्या प्रलंबित प्रश्नांवरून भारतीय किसान संघ, विदर्भ प्रांत (जिल्हा भंडारा) आक्रमक झाला आहे. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मंगळवारला (ता.०३) लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले असून, १५ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. दिलेल्या निवेदनाद्वारे भारतीय किसान संघाने प्रामुख्याने सरकारचे लक्ष वेधले असून, त्यात खरीप हंगाम २०१५-१६ मधील धानाचे चुकारे अद्याप मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, ते तात्काळ देण्यात यावेत. धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलवर बोनस न देता, दरवर्षीप्रमाणे हेक्टरी ३०,००० रुपये बोनस जाहीर करावा. ज्या शेतकऱ्यांनी कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी अर्ज केले आहेत, त्यांना तातडीने कनेक्शन देण्यात यावे. धानाची शासकीय खरेदी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यामुळे खरेदीचे उद्दिष्ट वाढवून सर्व धानाची खरेदी करावी. खरीप हंगामातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊनही अद्याप मदत मिळालेली नाही, ती तात्काळ वितरीत करावी. अशा मागण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, खरीप हंगामातील थकबाकी न मिळाल्यामुळे पुढील हंगामासाठी बळीराजाकडे भांडवल शिल्लक नाही. जर प्रशासनाने पुढील १५ दिवसांत या मागण्यांची दखल घेतली नाही, तर भारतीय किसान संघातर्फे मोठे आंदोलन उभारले जाईल आणि याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल. यावेळी भारतीय किसान संघाचे दिनेश कापगते, रूग्वेद येवले यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार यांचे अल्पशा आजाराने आज, 3 फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. एक निष्ठावान पदाधिकारी आणि अभ्यासू नेतृत्व गमावल्यामुळे राजकीय वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पगार यांच्या पार्थिवावर उद्या, बुधवार 4 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता उत्राने (ता. बागलाण, जि. नाशिक) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुमारे 40 वर्षांचा प्रदीर्घ संघटनात्मक अनुभव असलेले ॲड. रविंद्र नाना पगार 2012 पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळत होते. शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांसारख्या दिग्गज नेत्यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या पगार यांनी नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती म्हणूनही कार्य केले होते. तसेच आपल्या राजकीय प्रवासाच्या सुरुवातीला त्यांनी युवक काँग्रेस आणि 'एनएसयूआय' या विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्षपदही अत्यंत यशस्वीरीत्या भूषविले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि विविध जिल्ह्यांचे निरीक्षक म्हणून अनुभवी नेतृत्व राहिलेल्या ॲड. रविंद्रनाना पगार यांनी, 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस सोडल्यानंतर नाशिकमध्ये त्यांच्या समर्थनार्थ पहिला मेळावा घेत राष्ट्रवादीच्या जडणघडणीत ऐतिहासिक योगदान दिले होते. अलिकडच्या काळात अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरही, पगार यांनी जिल्ह्यातील पक्षसंघटना एकसंध ठेवत या नेत्यांना खंबीर साथ दिली होती. अशा या निष्ठावान आणि अनुभवी नेत्याच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्व स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची ११ फेब्रुवारीला होणार घोषणा
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली असून मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला आहे. ७ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्विकारले जाणार आहेत. तर ११ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची घोषणा केली जाणार आहे. ११ फेब्रुवारी रोजीच दुपारी १२ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. महापौरपादासाठी अर्ज मागे घेण्याची वेळ सभागृह […] The post मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची ११ फेब्रुवारीला होणार घोषणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशाच्या संसदेत प्रश्न मांडायचा नाही तर मग कुठे मांडायचा, संसदेत खासदारांनाच बोलू देत नाहीत, आपल्याच संसदेत बोलू दिले जात नाही, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. संसदेत झालेल्या गदारोळावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण आपल्या संसदेत विषय मांडायचा नाही मग पाकिस्तानच्या संसदेत जाऊन मांडायचा का? की चीनच्या संसदेत जाऊन हा विषय मांडायचा? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, देशाच्या संसदेत बोलू देत नाहीत. आपल्याच संसदेत बोलू दिले जात नाही. नरवणे यांच्या पुस्तकात काय लिहिले आहे हे समोर यायला पाहिजे, असे म्हणत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेचे समर्थन आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरे यांनी आज बारामती विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळी यांच्या वरळी येथील घरी जाऊन कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर या अपघाताची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. अजित दादा काम करणारा नेता होता आदित्य ठाकरे म्हणाले, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक अॅंगल आहेत, त्यामुळे ते पुढे यायला हवे. चांगला नेता आपण गमावला आहे. 2019-20 पासून अजित पवारांसोबत वेगळा बॉन्ड होता, अजित दादा काम करणारा नेता होता, असे ठाकरे यावेळी म्हणाले. डोकलामचा विषय चीनच्या संसदेत जाऊन मांडायचा का? डोकलाम हद्दीत चीनच्या घुसखोरीवरून संसदेत झालेल्या गदारोळावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आपण आपल्या संसदेत विषय मांडायचा नाही, मग पाकिस्तानच्या संसदेत जाऊन मांडायचा का? तसेच माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकात काय लिहिले आहे, वस्ताव काय होते? ते समोर यायला पाहिजे. हे सरकार राहुल गांधींना का घाबरत आहे? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला आहे. भारत आणि चीनच्या सीमारेषांसंदर्भातील डोकलामचा विषय चीनच्या संसदेत जाऊन मांडायचा का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
मोझरीत प्रहार संघटनेचे उपोषण सुरू:एस.टी. बसेस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल, महामंडळाला जाग
तिवसा तालुक्यातील मोझरी येथे प्रवाशांच्या हक्कासाठी प्रहार संघटनेने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आश्रम, महासमाधी, अनेक शैक्षणिक संस्था आणि आयुर्वेदिक रुग्णालये असलेल्या मोझरीमध्ये दररोज हजारो भाविक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि कामगार प्रवास करतात. मात्र, येथे प्रवाशांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. मोझरी हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, सार्वजनिक प्रवासाचे मुख्य साधन एसटी बस आहे. परंतु, अमरावती बस डेपो अंतर्गत येणाऱ्या अनेक बसेस मोझरी येथे थांबत नाहीत. तसेच, मोझरी आणि तिवसा येथील प्रवाशांना वाहक आणि चालकांकडून सातत्याने हीन वागणूक दिली जाते. अधिकृत थांबे असतानाही अनेक बस मोझरी व तिवसा येथे न थांबवता बायपासने धावतात, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असून, याबाबत वारंवार लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. यामुळे संतप्त झालेल्या प्रहार संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते संजय देशमुख यांनी मोझरी एसटी स्टँडवर बेमुदत उपोषणास सुरुवात केली. उपोषणाची दखल घेत महामंडळाचे विभाग नियंत्रक संदीप रायलवार आणि जयदीप घोडे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. त्यांनी प्रवाशांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका दर्शवली असून, येत्या काळात अनेक सुधारणा दिसून येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी सुरेंद्र देवगडे, कपिल उमप, इर्शाद बेग, योगेश लोखंडे, हेमंत तायडे, प्रेमानंद कांडलकर, अशोकराव लांजेवार, शरद खारोडे, श्याम काळकर, राजाभाऊ आंबेडकर, मोहन लोखंडे, विलास कांदळकर, मंगेश वानखडे, प्रशांत राऊत, नवीन कोचर, अमोल बेलसरे, मनोहर पुरी, नरेंद्र काकडे, अनिल मेश्राम आणि विवेक बेले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्यांची दखल घेत एसटी महामंडळ प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. चालक आणि वाहकांच्या वागणुकीत सुधारणा करण्यासाठी अमरावती आणि तिवसा येथील पंचवटी चौकात जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. प्रत्येक चालकाच्या लॉगशीटवर मोझरी बायपासने न जाता मोझरी व तिवसा थांब्यांवर बस थांबवून प्रवाशांना चढू देण्याबाबत लेखी सूचना दिल्या जातील. तसेच, मोझरी बस स्टँडवर दोन जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या उपाययोजना त्वरेने लागू केल्या जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) जनजागृती आणि गुणवत्ता वाढीसाठी 'स्कुल कनेक्ट' अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा पहिला प्रयोग मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या पुढाकाराने भानखेडा (बुद्रुक) येथील शाळेत यशस्वीपणे पार पडला. महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि इंग्रजी विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी श्री शिवाजी हायस्कूल, भानखेडाचे मुख्याध्यापक सतीश पाटील प्रमुख उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि रोपे देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सविता ठाकरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) तसेच गुणवत्ता वाढीबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी NEP 2020 ची गरज, विद्यार्थ्यांना विषय निवडीसाठी उपलब्ध असलेल्या संधी आणि भविष्यातील व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक कौशल्यांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना राऊत यांनी केले, तर आभार वऱ्हाडे यांनी मानले. मुख्याध्यापक पाटील यांनी आपल्या भाषणात वक्त्यांचा परिचय करून दिला आणि अशा जनजागृती कार्यक्रमांची भविष्यात गरज असल्याचे अधोरेखित केले. मानवी मूल्यांची शिकवण देणाऱ्या प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. इंग्रजी विभागाच्या प्रीती जवंजाळ आणि महाविद्यालयाचे विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते. शिक्षक राजूरकर, श्रीमती राऊत, जया ठाकरे आणि इतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी एक संवाद सत्र आयोजित करण्यात आले होते, ज्यात त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बद्दल प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. व्याख्यानानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अभिप्राय सत्राचेही आयोजन करण्यात आले होते, जिथे त्यांनी आपले विचार आणि मते मांडली.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून एका महिन्याच्या आत निवडणूक खर्चाचा अहवाल सादर न केल्याने जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या शंभराहून अधिक उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित नगरपालिकांनी उमेदवारांना अहवाल सादर करण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. या नोटीसनंतरही उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे अंतिम हिशेब सादर न केल्यास, तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांना पुन्हा नोटीस बजावण्यात येतील. जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल गेल्या महिन्यात १६ डिसेंबर रोजी घोषित झाला होता. या तारखेपासून एका महिन्याच्या आत सर्व उमेदवारांना आपापल्या निवडणूक खर्चाचे अंतिम हिशेब संबंधित तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात सादर करणे बंधनकारक होते. मात्र, शंभराहून अधिक उमेदवारांनी अद्यापही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. या निवडणुकीत अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चिखलदरा, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड आणि शेंदुरजनाघाट या १० नगरपालिका तसेच नांदगाव खंडेश्वर आणि धारणी या दोन नगरपंचायतींचा समावेश होता. यामध्ये एकूण १२ नगराध्यक्ष आणि २७८ नगरसेवक निवडून द्यायचे होते. नगराध्यक्षपदासाठी ६४, तर नगरसेवकपदासाठी १०४८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी बहुसंख्य उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर केला आहे, परंतु शंभराहून अधिक उमेदवारांनी अद्यापही याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संबंधित नगरपालिका प्रशासनाने त्यांना नोटीस बजावून एक आठवड्याची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत खर्च सादर न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुन्हा नोटीस पाठवण्यात येतील. नगरपालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बजावण्यात आलेल्या नोटीसनुसार उमेदवारांनी कार्यवाही न केल्यास, त्यांची माहिती थेट राज्य निवडणूक आयोगाला कळवण्यात येईल. जिल्हाधिकारी संबंधित उमेदवारांवर कारवाईची शिफारस करतील. या शिफारशीनुसार, राज्य निवडणूक आयोग संबंधित उमेदवारांना पुढील ६ वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढवण्यास बंदी घालू शकते.
मेळघाटमधील आरोग्य सेवांमधील त्रुटींवरून उच्च न्यायालयाने अलीकडेच जिल्हा आरोग्य विभाग आणि राज्य सरकारला फटकारले होते. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने नवीन उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समिती (DPC) मार्फत शासनाकडे १३६ कोटी १० लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, शासनाने या मागणीच्या तुलनेत ६४ कोटी रुपये कमी, म्हणजेच केवळ ७२ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) कार्यालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक (CS) यांनी संयुक्तपणे सन २०२६-२७ साठी आरोग्य सेवांचा आराखडा तयार केला होता. यामध्ये जिल्हा परिषदेने ७७ कोटी ५५ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली होती, तर उर्वरित मागणी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून करण्यात आली होती. अशा प्रकारे दोन्ही यंत्रणांनी मिळून एकूण १३६ कोटी १० लाख ५५ हजार रुपयांची मागणी डीपीसीकडे सादर केली. शासनाने जिल्ह्यातील इतर सर्व यंत्रणांच्या मागण्यांचा हवाला देत केवळ ७२ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच सरकारने दोन्ही यंत्रणांना ८९.५ कोटी रुपये दिले होते. यावर्षी अधिक उपाययोजना करण्याची गरज असताना, किमान गतवर्षीपेक्षा जास्त निधी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली आहे. निधी कपातीमुळे आरोग्य विभाग गोंधळात पडला असून, उपाययोजना कशा कराव्यात असा पेच अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. मागणी केलेल्या रकमेतून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांचे बांधकाम व विस्तारीकरण करायचे होते. तसेच, उर्वरित इमारतींसाठी अग्निसुरक्षा यंत्रणा खरेदी करणे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती करणे, आणि जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांसाठी औषधे व इतर साधनसामग्री खरेदी करणे अपेक्षित होते. याशिवाय, नव्याने सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी (GMC) आयसीयू, एनआयसीयू, बालरोग विभाग आणि कॅज्युल्टी विभाग अद्ययावत करणे आवश्यक आहे. यासाठी वाढीव निधी मिळणे गरजेचे असून, डीपीसीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे किती अतिरिक्त निधी मिळवून देतात, याकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष लागले आहे.
न्यायव्यवस्थेसाठी अर्थसंकल्पात अपुरी तरतूद:ॲड. असीम सरोदे यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेसाठी केलेल्या अपुऱ्या तरतुदीवर तीव्र टीका केली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेसाठी कोणतीही ठोस आणि स्वतंत्र तरतूद नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. देशात न्याय मिळवण्याची प्रक्रिया दिवसेंदिवस अधिक खर्चिक होत असताना ही तरतूद चिंताजनक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. न्यायव्यवस्थेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असावी, याबद्दल समाजात आणि राजकीय पातळीवर गांभीर्याचा अभाव दिसतो, असे सरोदे यांनी नमूद केले. आर्थिक तरतुदींच्या कमतरतेमुळे मूलभूत हक्कांशी संबंधित अनेक प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. बाल लैंगिक अत्याचारविरोधी विशेष न्यायालये (POCSO) आणि अॅट्रॉसिटी कोर्ट यांना आवश्यक सुविधा व मनुष्यबळासाठी सातत्याने संघर्ष करावा लागतो. यामुळे पीडितांना वेळेत न्याय मिळत नाही. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात बलात्कार आणि पॉक्सो प्रकरणांसाठी केंद्र सरकारने केवळ २०० कोटी रुपयांची तरतूद केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. एकूण राष्ट्रीय अर्थसंकल्पाच्या केवळ ०.०४ टक्के खर्च न्यायव्यवस्थेसाठी राखीव ठेवण्यात येतो, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. न्यायव्यवस्थेसाठी आर्थिक नियोजन केंद्र व राज्य सरकारांनी संयुक्तपणे करणे गरजेचे असताना, केंद्र सरकार हळूहळू आपली जबाबदारी झटकत असल्याचेही सरोदे यांनी म्हटले. ई-कोर्ट संकल्पना देशभर राबविण्यात आली असली, तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही. ई-कोर्टसाठी केवळ ७ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. डिजिटल पुरावे सादर होत असले, तरी त्यांचे प्रभावी परीक्षण करण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाचा अभाव आहे. न्यायालयांसोबत काम करणाऱ्या तंत्रज्ञांची आवश्यकता असून, त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद हवी, असे सरोदे म्हणाले. गावपातळीवर लवकर न्याय मिळावा, विशेषतः शेतकऱ्यांचा वेळ वाचावा, यासाठी ग्राम न्यायालयांची संकल्पना अस्तित्वात आणण्यात आली. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत ती अपयशी ठरत आहे. संपूर्ण देशासाठी ग्राम न्यायालयांसाठी केवळ ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, हे खेदजनक असल्याचे त्यांनी सांगितले. देशात व महाराष्ट्रात कोट्यवधी खटले प्रलंबित असून, त्याचा थेट फटका विकासाला बसत आहे. वेळेवर न्याय न मिळणे म्हणजे न्यायप्रक्रियेचेच नुकसान आहे. विकास साधायचा असेल, तर न्यायव्यवस्था आधुनिक, सक्षम आणि तत्पर करणे आवश्यक असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करणे काळाची गरज असल्याचे ॲड. सरोदे यांनी स्पष्ट केले. देशात आणि महाराष्ट्रात कोट्यवधी खटले प्रलंबित आहेत. प्रत्येक नागरिक अप्रत्यक्षपणे १५ ते २० खटल्यांचा आर्थिक भार सहन करत असल्याची परिस्थिती आहे. प्रलंबित खटल्यांमुळे देशाच्या विकासाला मोठा फटका बसत आहे. सरकारविरोधी खटल्यांचे प्रमाण अधिक असून, त्यांचे विश्लेषण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद धारणी पंचायत समितीच्या संघाने पटकावले आहे. या संघाने सांस्कृतिक स्पर्धांमध्येही उपविजेतेपद मिळवत सलग दुसऱ्या वर्षी आपला दबदबा कायम ठेवला. क्रीडा स्पर्धा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि किरण नगरातील नरसम्मा हिरय्या महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या. तर सांस्कृतिक कार्यक्रम विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरातील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवात जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांच्या संघांसह जिल्हा परिषद मुख्यालयाचा एक अशा एकूण १५ संघांनी सहभाग घेतला होता. सुमारे ३ हजार खेळाडूंचा सहभाग असलेल्या या क्रीडा स्पर्धेत धारणीच्या संघाने सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केली. कबड्डी, फुटबॉल, बॅडमिंटन, जलतरण आणि धावस्पर्धेत या खेळाडूंनी अव्वल स्थान पटकावले, ज्यामुळे त्यांना सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. मेळघाटचे नाव उज्वल करणाऱ्या धारणीने गतवर्षीही क्रीडा स्पर्धेत आपले वर्चस्व राखले होते. विजेत्या संघाला मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, डेप्युटी सीईओ श्रीराम कुळकर्णी, बाळासाहेब बायस, विलास मरसाळे, शिक्षणाधिकारी सतिश मुगल, योजना शिक्षणाधिकारी सुरेश वाघमारे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, बिडीओ स्नेहल शेलार, स्वप्निल मगदुर, अभिषेक कासोदे, सुधीर अरबट, तुषार दांडगे, विनोद खेडकर, प्रफुल्ल भोरखडे व विजय गायकवाड, गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे, संदीप बोडखे, विनोद गाडे, पंकज गुल्हाने आदी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते धारणीच्या सर्व खेळाडू आणि कलावंतांचा सत्कार करण्यात आला. तीन दिवसीय क्रीडा महोत्सवातील सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ, दिव्यांग खेळाडू आणि सांस्कृतिक कार्यक्रमातील कलावंतांना चषक व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. श्रीराम कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले, तर मनीष काळे आणि शैलेंद्र दहातोंडे यांनी सूत्रसंचालन केले. उपशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे प्रमुख, उपप्रमुख, सदस्य तसेच प्रसिद्धी विभागाचे पदाधिकारी विनोद गाडे, राजेश सावरकर, विनायक लकडे, शरद गढीकर, हेमंतकुमार यावले, पूनम उके यांनी विशेष परिश्रम घेतले.
राज्यसभेत खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) च्या आंतरराष्ट्रीय विस्ताराशी संबंधित नियामक, तांत्रिक आणि सुरक्षा आव्हानांवर लक्ष वेधले. भारताची ही डिजिटल पेमेंट प्रणाली सध्या आठ देशांमध्ये कार्यरत असून, तिचा जागतिक वापर वाढत आहे. प्रश्न उत्तराच्या तासात, डॉ. कुलकर्णी यांनी सरकारकडून यूपीआय कार्यरत असलेल्या देशांची माहिती, आंतरराष्ट्रीय व्यवहारांची संख्या व मूल्य, तसेच भारतीय प्रवासी आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी पुढील विस्ताराचा आराखडा काय आहे, याची विचारणा केली. यावर लेखी उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, यूपीआय सध्या भूतान, फ्रान्स, मॉरिशस, नेपाळ, कतार, सिंगापूर, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे कार्यरत आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षांत आंतरराष्ट्रीय यूपीआय व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०२३-२४ मध्ये ३७,०६० व्यवहारांवरून डिसेंबर २०२५ अखेर १४.८६ लाखांहून अधिक व्यवहार झाले आहेत. तसेच, व्यवहार मूल्य १,९७० लाख रुपयांवरून ३३,०४३ लाख रुपयांपर्यंत वाढले आहे. पुरवणी प्रश्नांद्वारे डॉ. कुलकर्णी यांनी यूपीआयला इतर देशांच्या पेमेंट प्रणालींशी जोडताना येणाऱ्या नियामक, तांत्रिक आणि द्विपक्षीय समन्वयाच्या अडचणी स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यांनी डेटा लोकलायझेशन, सायबर सुरक्षा, मनी लॉन्डरिंग आणि दहशतवाद वित्तपुरवठा प्रतिबंध नियमांचे पालन, तसेच सेटलमेंट जोखमींसारख्या मुद्द्यांवर यजमान देशांच्या नियामकांनी व्यक्त केलेल्या चिंतांवरही प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, यूपीआयचा जागतिक विस्तार करण्याची जबाबदारी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) उपकंपनी, NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडकडे आहे. विविध देशांमधील तांत्रिक पायाभूत सुविधा, चलन विनिमय व्यवस्था, पेमेंट स्कीम्सचे मालकी हक्क आणि वेगवेगळ्या नियामक चौकटींमुळे आव्हाने निर्माण होत आहेत. चौधरी यांनी पुढे नमूद केले की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भागीदार देशांच्या समन्वयाने या अडचणी, तांत्रिक उपाय आणि द्विपक्षीय सहकार्याच्या माध्यमातून दूर केल्या जात आहेत. या आव्हानांनंतरही यूपीआय आठ देशांमध्ये यशस्वीपणे कार्यरत असल्याने भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर जागतिक स्तरावर विश्वास निर्माण झाला आहे. सरकारने भविष्यातही यूपीआयचा आंतरराष्ट्रीय विस्तार वाढवून सुरक्षित, जलद आणि परवडणाऱ्या सीमापार डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याची कटिबद्धता व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांकडून पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा
मुंबई : प्रतिनिधी वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुणे शहर व परिसर गुंतवणुकीचे आकर्षण बनले आहे. त्यामुळे पुणे शहर व परिसरात औद्योगिकरण वाढत आहे. नागरिकरणाचा वेगही गतिमान आहे, अशा परिस्थितीत भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विमानतळासाठी भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून […] The post मुख्यमंत्र्यांकडून पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा(सी-टीईटी)देणा-या शिक्षकांना निवडणूकीच्या कामातून सूट
मुंबई : प्रतिनिधी ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणा-या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली असून तसे निर्देश सर्व संबंधित जिल्हाधिका-यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्यानंतर १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदानाच्या तारखेत […] The post केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा(सी-टीईटी)देणा-या शिक्षकांना निवडणूकीच्या कामातून सूट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असून सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. पुणे हा अजित पवारांचा गृह जिल्हा आहे. त्यांनी गेली अनेक वर्ष पुण्याचे पालकमंत्री […] The post पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय भंडारा मार्फत भंडारा ग्रंथोत्सव 2025 चे आयोजन पाच व सहा फेब्रुवारी रोजी जकातदार माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवाच्या आयोजनाच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन, विक्री तसेच विविध साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या ग्रंथोत्सवाचा ग्रंथ चळवळ रुजवण्यासाठी महत्त्वाचा वाटा असेल. गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाच ग्रंथ पूजन व ग्रंथ दिंडीने शुभारंभ होणार आहे यावेळी जिल्हाधिकारी सावन कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरीगड्डे , शिक्षणाधिकारी मनीषा गजभिये, शिक्षणाधिकारी प्राथमिक रवींद्र सोनटक्के ,ग्रंथालय संचालक रामदास साठे आणि जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष धनंजय दलाल उपस्थित राहणार आहेत. सकाळी ग्रंथ पूजन व ग्रंथ दिंडी नंतर अकरा वाजता ग्रंथोत्सव उद्घाटन समारंभ व ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न होईल. या उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उद्घाटक म्हणून तर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानेश वाकुडकर हे असणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन समारंभा नंतर गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते पाच वाजे दरम्यान दरम्यान चला वाचन करू, या नवीन पिढी घडवूया, हा परिसंवाद आहे. या परिसंवादामध्ये प्राध्यापक नरेश आंबीलकर, डॉ. प्रकाश मालगावे, ग्रंथपाल डॉ. धनंजय गभने आणि तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी विजय निचकवडे व प्राध्यापक अजिंक्य भांडारकर सहभागी होणार आहेत. शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 1 वाजे दरम्यान महिला व ग्रंथालय या विषयावर महाचर्चा होणार असून सहभागी वक्त्यांमध्ये समाजसेविका सविता बेदरकर, अधीक्षक सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय, छाया भुसारी ,डॉ. ममता राऊत प्राध्यापिका जे .एम. पटेल महाविद्यालय व शैलजा दांदळे, जिल्हा माहिती अधिकारी भंडारा यांचा समावेश असणार आहे. दुपारी एक ते दोन या दरम्यान मी अहिल्याबाई होळकर बोलतेय हे एकपात्री नाटक जकातदार विद्यालय ची विद्यार्थिनी कुमारी खुशी आदेश तितीरमारे सादर करणार आहे. दुपारी अडीच ते साडेचार वाजे दरम्यान कवी संमेलन होणार असून या कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रमोद कुमार शाहू हास्य कवी तुमसर हे असणार आहेत,तर सहभागी कवींमध्ये विजय बघेले ,तुमसर व शफीकल्ला करीम सय्यद भंडारा हे असणार आहेत. दुपारी साडेचार ते साडेपाच वाजे दरम्यान समारोपीय कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण असतील. तरी या कार्यक्रमांमध्ये ग्रंथ प्रेमींनी,वाचकांनी, नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावी ,असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेन्द्र बोपचे यांनी केले आहे.
भंडारा जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक व युवतींकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करून त्यांना खाजगी क्षेत्रातील नामांकित कंपन्याच्या माध्यमातून अधिक मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून दिला जातो. त्या अनूषंगाने, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा, यांच्या तर्फे दिनांक 03 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी. 3.00 या वेळेत या कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळावा संपन्न झाला. सदर रोजगार मेळाव्यामध्ये 04 नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यांचेमार्फत एकूण 75 रिक्तपदांकरीता उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सदर मेळाव्यात एकूण 87 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये पुरूषांची संख्या 42 व महिलांची संख्या 45 इतकी आहे. 65 उमेदवारांनी प्रत्यक्ष आणि 22 उमेदवारांनी गुगलफॉर्मद्वारे नोंदणी केली होती. सदर रोजगार मेळाव्यात 65 उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शविली होती. त्यापैकी 65 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यापैकी 17 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. सदर रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनीय कार्यक्रमात उद्घाटक तथा प्रमूख अतिथी म्हणून वि.मा. पांडव कौ.वि.रो. व मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा, आशालता वाल्दे क.कौ.वि.मार्गदर्शन अधिकारी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर, वि. मा. पांडव कौ.वि.रो. व उ. मार्गदर्शन अधिकारी यांनी जिल्हयातील युवक व युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कार्यालयामार्फत रोजगार मेळावा आयोजित केले असल्याचे सांगीतले. उमेदवारांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या मुबलक प्रमाणात संधी उपलब्ध असून त्यांचेमार्फतही सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. उमेदवारांनी सुरूवातील कमी मानधन न पाहता मेहनतीने यशाची उंच शिखरे गाठावीत तसेच आवश्यक कौशल्य आत्मसात करून रोजगाराची संधी प्राप्त करावी. उमेदवारांना रोजगार सुरू करण्यासाठी ही सुवर्णसंधी असून या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा याबाबत उमेदवारांना बहूमुल्य मार्गदर्शन केले. सदर रोजगार मेळावाच्या उदघाटनीय कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार श्री अमीत मलोडे ( लीपीक टंकलेखक ) यांनी केले. सदर रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा कार्यालयातील डॉ.सुधाकर झळके, सहायक आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली कार्यालयांतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही मागणी केली आहे. यावर भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली जात असून यावर मंत्री पंकजा मुंडे यांना विचारले असता, या योजनेला अजितदादा पवारांचे नाव देण्याबाबत मागणीवर मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्याला आमचे समर्थन राहील, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभेनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. पंकजा मुंडे यांच्या देखील हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यावर त्यांनी सांगितले की, हे मला सकाळी सांगण्यात आले. काय बिघाड झाला माहीत नाही. मी दौऱ्यावर निघणार होते त्यावेळी मला कळवण्यात आले की हेलिकॉप्टर उडू शकणार नाही. तसेच अजित पवारांच्या मृत्यूवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली होती. यावर बोलताना मुंडे म्हणाल्या, अशा प्रकारची दिशाभूल झाली नाही पाहिजे, राजकारणात हे पथ्य सगळ्यांनी पाळले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. लाडकी बहीण योजनेला 'अजित दादांची लाडकी बहीण' असे नाव द्यावे- अमोल मिटकरी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, अजित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेला अजित दादांची लाडकी बहीण असे नाव द्यावे. अजित पवार यांच्या स्मृती लाडक्या बहिणींच्या मनात कायम जपल्या जाव्यात, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली असून, ही एक प्रकारची आदरांजली असल्याचे मिटकरी म्हणाले. तसेच हीह योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी आवश्यक असल्यास योजनेत काही बदल करावेत, असेही त्यांनी सूचित केले आहे.
वाहतूक नियम पाच वेळा मोडल्यास वाहनाची नोंदणीच रद्द
नागपूर : केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन कायदा, १९८९ मध्ये दुरुस्ती केल्याने वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणा-यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. नवीन तरतुदीनुसार एका वर्षात पाच वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनाची नोंदणी तसेच चालकाचा वाहनचालक परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल. वाढते रस्ते अपघात आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे जाणारे निष्पाप जीव वाचवण्यासाठी हे […] The post वाहतूक नियम पाच वेळा मोडल्यास वाहनाची नोंदणीच रद्द appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वर्ल्ड बँक अध्यक्षांनी पाकला फटकारले
इस्लामाबाद : पंजाबमधील जालंधर येथे जन्मलेले जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानने अंथरलेले रेड कार्पेट काही कामाचे ठरले नाही. बंगा यांच्या दौ-यादरम्यान पाकिस्तानने त्यांना खूश करण्यासाठी त्यांचे उत्साहात स्वागत केले. तरीही, बंगा यांनी कर्जाच्या मुद्द्यावर पाकिस्तानी मंत्र्यांना चांगलेच फटकारले. जागतिक बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले की, पाकिस्तान कर्ज घेत आहे, पण ही मदत फुकट दिली […] The post वर्ल्ड बँक अध्यक्षांनी पाकला फटकारले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मोदींनी ठरवले पाक क्रिकेट बोर्ड नष्ट होईल
इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी आणि बीसीसीआयशी वाकड्यात जाऊन स्वत:साठी मोठी समस्या निर्माण केली आहे. पाकिस्तानने २०२६ च्या आयसीसी टी २० विश्वचषकात भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवाय, त्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे पाकिस्तानची स्थानिक टी२० लीग पीएसएलदेखील उद्ध्वस्त होऊ शकते. यादरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि […] The post मोदींनी ठरवले पाक क्रिकेट बोर्ड नष्ट होईल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राजपाल यादवला आज शरण येण्याचे आदेश
नवी दिल्ली : चेक बाऊन्स प्रकरणात दिल्लीउच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवविरोधात कडक भूमिका घेतली आहे. न्यायालयाने नाराजी व्यक्त करत, राजपाल यादवला ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत संबंधित तुरुंग अधीक्षकांसमोर सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, वारंवार दिलेल्या संधी आणि आश्वासनांनंतरही राजपाल यादवने ठरलेली रक्कम अदा केलेली नाही. हे न्यायिक […] The post राजपाल यादवला आज शरण येण्याचे आदेश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : एकीकडे अजित पवारांच्या झालेल्या विमान अपघातामुळे सा-यांनाच धडकी भरलेली असताना एअर इंडियाच्या लंडन-बंगळुरू विमानामध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या अहमदाबाद विमान अपघातावेळसारखाच बिघाड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एअर इंडियाने बोईंग ७८७ च्या फ्युअल कंट्रोल स्विचची पुन्हा तपासणी सुरु केली असून बोईंग कंपनीलादेखील याबाबत कळविण्यात आले आहे. लंडन ते बंगळुरू या विमान प्रवासादरम्यान बोईंग […] The post फ्युअल स्वीच आपोआप बंद होतोय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सातारा पोलिस डायरी:गाडीच्या डॅशबोर्डमधून 2 लाखांची रोकड लंपास; तर पोलिसांकडून अवैध दारू जप्त
सातारा तालुका हद्दीतील मौजे आटाळी येथील हेरिटेजवाडी हॉटेलच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या चारचाकी क्रमांक(एम.एच. १२ जे.यु. ५५४९)च्या डॅशबोर्डच्या ड्रॉव्हर मध्ये ठेवलेली २ लाखांची रोख रक्कम तेजश्री संतोष सकटे(रा.६३ दुर्गापेठ, सातारा) हिने संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद रविराज दत्तात्रेय हादगे (वय ३३, व्यवसाय इव्हेंट मॅनेजमेंट. राहणार १४०,रामाचा गोट सातारा) यांनी सातारा तालुका पोलिसांत दि.२ रोजी दिली आहे.अधिक तपास पोलीस हवालदार किरण जगताप करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सातारा तालुका पोलिसांनी दारूच्या बाटल्या केल्या जप्त सातारा तालुका पोलिसांनी मौजे देगाव गावच्या हद्दीत असलेल्या तळ्याजवळ १८० मिलीच्या एकूण ९६ दारूच्या बाटल्या आणि हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस गाडी (एम.एच ११ बी.टी ८८५२) असा एकूण ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अवधूत धर्मराज चव्हाण (वय २६ वर्ष राहणार वेळे कामथी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत. माजगावकर माळ शाहूपुरी येथे घरफोडी आकाशवाणी केंद्राजवळ असलेल्या माजगावकर माळ येथून दि ३० रोजी बंद असलेल्या पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील बाजूचा सिमेंटचा दरवाजा अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी साहाय्याने फोडून घरामध्ये प्रवेश केला. यामध्ये ४७ हजार ४०० रुपययांचे सोने-चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोख रक्कम असे ऐकून ६७,४०० रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबतची फिर्याद संगीता अनिल पवार (वय ४५ वर्ष राहणार आकाशवाणी केंद्राजवळ सातारा) यांनी शाहूपुरी पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार घोडके करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चारचाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल सातारा कोरेगाव रोडवर एच. पी.गॅस समोर क्षेत्र माऊली येथे राहणारे सेवानिवृत्त शिक्षक अण्णा शिवाजी पवार(वय ५९) यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये कंपाउंडच्या पोर्चमध्ये पार्क केलेल्या चार चाकी गाडीची मागील बाजूची काच फोडून ५० हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी अशोक कुंडलिक खाडे आणि राज दशरथ दास (दोघे राहणार क्षेत्र माहुली,सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात दिनांक २ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील संशयितांनी पवार यांच्या गाडीचे पाच वेळा नुकसान करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आम्ही काय निर्णय घ्यावा हे लोक ठरवणार का?
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. विरोधकांनीही या प्रकरणात उडी घेतली असून राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे. यातच शरद पवार यांचा दिल्ली दौरा रद्द झाला असून ते बारामतीला जात असल्याचे म्हटले जात आहे. यावरून काही तर्क-वितर्क सुरू झाल्याचे पाहायला […] The post आम्ही काय निर्णय घ्यावा हे लोक ठरवणार का? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नियम पाळायचे नसतील तर देश सोडा
नवी दिल्ली : कुठलीही कंपनी डेटा शेअरिंगच्या नावाखाली देशातील जनतेच्या खासगी अधिकाराशी खेळू शकत नाही. जर भारतातील नियम तुम्हाला पाळायचे नसतील तर तुम्ही देश सोडून जा अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने व्हॉटस् अप आणि मेटाला फटकारले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. ज्यात मेटा आणि व्हॉट्सअप यांनी कॉम्प्टीशन कमिशन ऑफ इंडियाच्या निर्णयाविरोधात […] The post नियम पाळायचे नसतील तर देश सोडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रात ठाकरे सरकारमुळे प्रकल्पाला उशीर
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २३ हजार ९२६ कोटींची तरतूद करण्यात आली असून सध्या राज्यात १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ पर्यंत सुरू होणार आहे. बुलेट ट्रेन गुजरातमध्ये पहिल्यांदा धावणार आहे. सुरुवातीला १ ते २ तासांच्या अंतराने आणि […] The post महाराष्ट्रात ठाकरे सरकारमुळे प्रकल्पाला उशीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘त्या’ करारात नेमके काय, कळायला हवे
नवी दिल्ली : बहुप्रतिक्षित भारत-अमेरिका ट्रेड डील जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून यावर टीका आणि प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, काँग्रेस नेते शशि थरूर यांनी या करारावर संतुलित प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय वस्तूंवरील कर ५० टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांपर्यंत कमी केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, गुंतवणूक आणि निर्बंधांबाबत काही महत्त्वाचे सवालही उपस्थित केले आहेत. शशि […] The post ‘त्या’ करारात नेमके काय, कळायला हवे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बॅटही पकडता न येणा-यांना कशाला घेता?
नवी दिल्ली : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टाने मंगळवारी स्पष्ट नकार दिला. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती कायम ठेवत, सुप्रीम कोर्टाने एमसीएच्या कारभारावर अत्यंत कडक ताशेरे ओढले. उच्च न्यायालयाने तुम्हाला मोठा गैरव्यवहार करण्यापासून रोखले आहे, अशा शब्दांत न्यायालयाने एमसीएला आणि एमसीएचे विद्यमान अध्यक्ष रोहित पवार यांना फटकारले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्य […] The post बॅटही पकडता न येणा-यांना कशाला घेता? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गोचिडांमुळे ‘मंकी फीवर’ आजाराचा धोका वाढतोय!
बंगळूूरू : कर्नाटकमध्ये ‘क्यासानूर फॉरेस्ट डिसीज’ (केएफडी) म्हणजेच मंकी फीवरमुळे एका २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून या आजाराबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. तिरथहल्ली तालुक्यातील रहिवासी असलेल्या या तरुणाचा २८ जानेवारी रोजी उडुपी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोग्य विभागाचे आयुक्त गुरुदत्ता हेगडे यांनी माहिती […] The post गोचिडांमुळे ‘मंकी फीवर’ आजाराचा धोका वाढतोय! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पिंपरी-चिंचवड शहरातील स्पा सेंटर्स आणि लॉजच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली असून एकूण आठ महिलांची सुटका केली आहे. या धडक मोहिमेत विशालनगर येथील इंटरनल फॅमिली स्पामधून चार, निगडी येथील ईगल स्पामधून दोन, तसेच कृष्णा लॉज आणि आळंदी येथील योगीराज लॉजवर छापे टाकून प्रत्येकी एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनायक कुमार चौबे यांच्या आदेशानुसार, स्पा सेंटर्समधील बेकायदेशीर वेश्याव्यवसायाला आळा घालण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. ही धडक मोहीम पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी या पथकाचे यशस्वी नेतृत्व केले. वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 'इंटरनल फॅमिली स्पा'वर रात्री 10 च्या सुमारास धाड टाकत पोलिसांनी चार पीडित महिलांची सुटका केली असून याप्रकरणी स्पा व्यवस्थापक अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम याला अटक करण्यात आली आहे. या अवैध व्यवसायाचे संचलन करणाऱ्या संबंधित महिलेसह मॅनेजरवर 'पीटा' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. निगडी येथील ईगल स्पा, कृष्णा लॉज आणि आळंदीतील योगीराज लॉजवर पोलिसांनी धडक कारवाई करत पीडित महिलांची सुटका केली आहे. अधिक पैशांचे आमिष दाखवून आणि जबरदस्ती करून महिलांना या बेकायदेशीर वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ओढले जात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. शहरातील अशा अनैतिक प्रकारांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी कठोर पावले उचलली असून, गेल्या एका महिन्यात तीन मोठ्या आस्थापनांवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. यामध्ये चिंचवडमधील निक्की लॉज, काळेवाडीतील लेमन ग्रास थाई स्पा आणि सांगवी येथील औरा थाई स्पा यांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, 2025 सालात आतापर्यंत पोलिसांनी एकूण 25 स्पा सेंटर्सवर छापे टाकून 'पीटा' कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या सातत्यपूर्ण मोहिमेत आतापर्यंत 45 आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल 63 पीडित महिलांची सुरक्षितरीत्या सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कारभार पारदर्शक, लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने 'साहित्य संवर्धन आघाडी'ने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. साहित्य चळवळीला व्यापक सामाजिक अधिष्ठान मिळावे, वाचनसंस्कृती बळकट व्हावी आणि नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम प्रभावीपणे व्हावे, यासाठी ठोस कार्यक्रम राबवण्याचा निर्धार या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे. आघाडीने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा संपूर्ण कारभार घटनात्मक चौकटीत, पारदर्शक आणि सदस्याभिमुख पद्धतीने चालवला जाईल. राज्यभरातील परिषदेच्या जिल्हा शाखांना सक्षम करण्यासाठी दरवर्षी ठराविक आर्थिक मदत दिली जाईल. या निधीतून स्थानिक पातळीवर साहित्यिक उपक्रम, वाचन चळवळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास प्रोत्साहन मिळेल. दरवर्षी एका जिल्ह्यात विभागीय साहित्य संमेलन आयोजित करून स्थानिक लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा जाहीरनाम्यात उल्लेख आहे. युवा लेखकांना योग्य दिशा देण्यासाठी लेखन कार्यशाळा, संवाद सत्रे आणि मार्गदर्शन शिबिरे शाखांमार्फत राबवली जातील. परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या मराठी भाषेच्या परीक्षांना राज्य शासनाची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी शाळा व महाविद्यालयांशी समन्वय साधला जाईल. परिषदेच्या वास्तूसाठी अधिक जागा मिळवण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, तसेच आर्थिक स्वावलंबनासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यावर भर दिला जाईल. आजीव सदस्यांना ग्रंथप्रकाशन व अन्य उपक्रमांसाठी सभागृह अत्यल्प शुल्कात उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीरनाम्यात आहे. 'साहित्य पत्रिका' पुन्हा मुद्रित स्वरूपात प्रत्येक आजीव सदस्यापर्यंत पोहोचवली जाईल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तो सार्थ ठरेल असे कृतीशील कार्यक्रम राबवले जातील, असेही नमूद करण्यात आले. 'पुणे पुस्तक महोत्सवा'ला मिळणाऱ्या प्रतिसादाचा उल्लेख करत, १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने १०० पुस्तक महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन जाहीर झाले आहे. 'जिथे मराठी तेथे साहित्य परिषद' या संकल्पनेतून जगभरातील मराठी माणसाला मराठीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. साहित्य निर्मितीमध्ये लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवणे, परप्रांतीयांमध्ये मराठीविषयी आस्था निर्माण करणे आणि लेखक, वाचक, प्रकाशक, वितरक व विक्रेते या सर्व घटकांसाठी सक्रिय भूमिका घेण्याचा निर्धार आघाडीने व्यक्त केला आहे. या निवडणुकीत 'साहित्य संवर्धन आघाडी'कडून अध्यक्षपदासाठी योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदासाठी स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्षपदासाठी प्रदीप निफाडकर हे उमेदवार आहेत.
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी जिल्ह्यात एकूण २९ लाख ७६ हजार ४५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १५ लाख २६ हजार ९८६ पुरुष, १४ लाख ४९ हजार ३७३ स्त्री आणि ९५ इतर मतदारांचा समावेश आहे. येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यात २ लाख ६४ हजार ६४२, मावळमध्ये २ लाख ३१६, मुळशीत १ लाख ७३ हजार ४०१, शिरूरमध्ये ३ लाख १ हजार ९५६ आणि हवेली तालुक्यात २ लाख ५१ हजार ५३३ मतदार आहेत. त्याचप्रमाणे, दौंड तालुक्यात २ लाख ७३ हजार १००, इंदापूरमध्ये ३ लाख २१ हजार २, पुरंदरमध्ये १ लाख ८९ हजार ४०३, भोरमध्ये १ लाख ५४ हजार ८१०, वेल्हेमध्ये ५५ हजार २३०, आंबेगावमध्ये १ लाख ८४ हजार ५२, जुन्नरमध्ये ३ लाख ७ हजार २२३ आणि खेड तालुक्यात २ लाख ९९ हजार ७८६ मतदार आहेत. मतदान केंद्रांच्या संख्येनुसार, बारामती तालुक्यात २९९, मावळमध्ये २४३, मुळशीत २२७, शिरूरमध्ये ३३७, हवेलीत २६३, दौंडमध्ये ३१७, इंदापूरमध्ये ४००, पुरंदरमध्ये २३५, भोरमध्ये २३७, वेल्हेमध्ये १०५, आंबेगावमध्ये २३९, जुन्नरमध्ये ३६६ आणि खेड तालुक्यात ३३७ मतदान केंद्रे आहेत. या एकूण मतदान केंद्रांमध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ आदर्श आणि महिला मतदान केंद्रांचाही समावेश आहे.
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मेफेड्रोन विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेबारा लाख रुपये किमतीचे २७ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. ही कारवाई नगर रस्ता परिसरात करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोतीसिंह श्रावणसिंह राजपुरोहित (वय २८, रा. धोका बिल्डिंग, लोहगाव रस्ता, वाघोली) आणि हरीश सुजनाराम देवासी (वय २२, रा. बायएफ रस्ता, वाघोली) अशी आहेत. दोघेही मूळचे राजस्थानचे रहिवासी आहेत. खराडी भागात अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना, हे दोघे मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. हे मेफेड्रोन कोणाकडून आणले आणि ते कोणाला विकणार होते, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड, तसेच पोलीस कर्मचारी संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनील महाडिक, गणेश गोसावी, संदीप देवकाते, देवीदास वांढरे, शुभांगी म्हाळसेकर आणि दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटमार दुसऱ्या एका घटनेत, मोटारीतून पुणे स्टेशनला सोडण्याच्या बहाण्याने एका तरुणाला लुटणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मोबाइल संच आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल किसन सावंत (वय १९, रा. समर्थनगर, खराडी, मूळ रा. अंबाजोगाई, जि. बीड), निशांत झुंबर बागुल (वय २१, रा. चिखलटाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर) आणि महेश रामकिसन सोनटक्के (वय २०, रा. खांदवेनगर, लोहगाव) यांचा समावेश आहे. नगर रस्ता परिसरात पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत थांबलेल्या एका तरुणाला आरोपींनी मोटारीतून सोडण्याची बतावणी केली. वाटेत त्याला मारहाण करून त्याच्याकडील रोकड आणि मोबाइल संच लुटून ते पसार झाले होते. या प्रकरणी येरवडा येथील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट चारकडून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू होता. आरोपी खराडी भागातील एका उपाहारगृहात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून तिघांना पकडण्यात आले. सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांचन जाधव, उपनिरीक्षक वैभव मगदूम, सहायक फौजदार हरीश मोरे, एकनाथ जोशी आणि प्रवीण भालचिम यांच्या पथकाने ही कारवाई केली.
एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) कॅडेट, कनिष्ठ अंडर ऑफिसर (जेएनओ) तनू भान हिने नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या प्रतिष्ठित एनसीसी प्रजासत्ताक दिन कॅम्पमध्ये (आरडीसी) सर्वोत्तम कॅडेट होण्याचा बहुमान पटकावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. या कॅम्पमध्ये तनू भानने ३६ महाराष्ट्र बटालियनचे प्रतिनिधित्व करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. तिच्यासोबत एमआयटी एडीटी विद्यापीठाचा व्यंकटेश अय्यर यानेही एनसीसी ३६ महाराष्ट्र बटालियनमध्ये स्थान मिळवत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्रातून सर्वोत्तम कॅडेट्स म्हणून निवड झाल्यानंतर, या दोन्ही कॅडेट्सनी देशातील १७ डायरेक्टरेट्समधील २० लाखांहून अधिक कॅडेट्समध्ये सर्वोच्च स्तरावर स्पर्धा केली. त्यामध्ये तनू भानने उत्कृष्ट शिस्त, नेतृत्वगुण आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर व्यंकटेशनेही दाखवलेली जिद्द उल्लेखनीय ठरली. २८ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे आयोजित एका समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तनू भानला हे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. तिची ही ऐतिहासिक कामगिरी महाराष्ट्र डायरेक्टरेट, संपूर्ण एनसीसी तसेच एमआयटी एडीटी विद्यापीठासाठी अभिमानास्पद ठरली आहे. या दोन्ही कॅडेट्सना एमआयटी एडीटी विद्यापीठातील एनसीसी विभागाचे संचालक ब्रिगेडियर मंगेश विटेकर (नि.) तसेच असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट अक्षता परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा. डॉ. सुनीता कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस. आणि कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी अभिनंदन केले आहे.
अजित पवारांचा होणार नाही दशक्रिया विधी
बारामती :प्रतिनिधी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पारंपरिक धार्मिक विधींबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांच्या बंधू श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. २८ जानेवारी रोजी बारामतीकडे येत असताना झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारानंतरच्या विधींमध्ये ३० जानेवारी हा दिवस निर्णायक […] The post अजित पवारांचा होणार नाही दशक्रिया विधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातानंतर राज्याच्या राजकारणात शोककळा पसरली असतानाच, आता बड्या नेत्यांच्या प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना एक महत्त्वाचा आणि मित्रत्वाचा सल्ला देणार असल्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. अजित पवारांचा अपघात हा संशयास्पद असून, नितीन गडकरी यांनी आता छोट्या आणि खासगी विमानाने प्रवास करणे टाळावे. असे सांगणार आहे. असे अनिल देशमुख म्हणालेत. अजित पवारांच्या निधनामुळे व्यथित झालेल्या अनिल देशमुखांनी सुरक्षेच्या कारणास्तव नितीन गडकरी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अजित पवारांचा झालेला अपघात मनाला चटका लावणारा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जर मला कधी विमानतळावर भेटले, तर मी त्यांना नक्की सांगेन की, तुम्ही आता छोट्या आणि खासगी विमानाने प्रवास करू नका. अशा विमानांच्या सुरक्षेबाबत आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. धुकं होतं तर व्हिडीओ आलाच कसा? अजित पवारांच्या विमान अपघाताच्या कारणांवर भाष्य करताना अनिल देशमुखांनी प्रशासनाच्या 'धुकं' असल्याच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बारामती विमानतळावर धुकं असल्याने धावपट्टी दिसली नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, अपघाताचा जो व्हिडीओ समोर आला आहे, तो खूप लांबून काढलेला आहे. व्हिडीओमध्ये विमान हवेतच तिरके झाल्याचे दिसते. त्यामुळे केवळ धुक्यामुळे हा अपघात झाला आहे, यावर कोणाचाही विश्वास नाही. जर खरंच तिथे दाट धुकं असतं, तर इतक्या लांबून व्हिडीओ काढणं शक्य होतं का? असा सवाल अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. या कारणांमुळेच, केवळ डीजीसीएची (DGCA) चौकशी पुरेशी नसून उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती नेमून या प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. दोन्ही NCPच्या विलीनीकरणाबाबत मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरही स्फोटक माहिती दिली. विलीनीकरणाच्या चर्चा हवेत नाहीत. आतापर्यंत दोन्ही गटांच्या १४ बैठका झाल्या आहेत आणि त्यातील काही बैठकांना मी स्वतः उपस्थित होतो. कोणत्या बैठकीत काय ठरलं आणि कोण हजर होतं, याची सर्व माहिती अजितदादांचा दुखवटा संपल्यानंतर आम्ही पुराव्यानिशी जाहीर करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

30 C