लॉकडाऊनबाबत अफवा पसरवल्यास फौजदारी कारवाई
मुंबई : सोशल मीडियावर देशात लॉकडाऊन लागू होणार असल्याची अफवा पसरवली जात असल्याने पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले की, मध्य पूर्वेतील युद्धामुळे भारताच्या शेजारच्या देशात शटडाऊनची परिस्थिती आली आहे. मात्र, आपल्या केंद्र सरकारने उत्तम व्यवस्था केली आहे. लोकांनी विनाकारण पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये. आपल्याकडे एक महिना पुरेल एवढा […] The post लॉकडाऊनबाबत अफवा पसरवल्यास फौजदारी कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईत सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणाऱ्या कथित व्हिडीओ प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात झिरवळ यांचा तातडीने राजीनामा घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरवेळी आरोप झाले की राजीनामा घ्यायचा, ही पद्धत योग्य नाही, अशी भूमिका पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राज्यात भोंदू अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच झिरवळ यांचे काही कथित व्हिडीओ समोर आल्याने राजकीय वातावरण तापले होते. या व्हिडीओमुळे झिरवळ यांच्यावर कारवाई होणार का, याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने झिरवळ यांना अभय देत त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले आहे. याआधी पक्षातील काही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्याने या निर्णयाकडे विशेष लक्ष लागले होते. यापूर्वी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निकटवर्तीयांच्या अटकेनंतर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच, न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनाही पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे झिरवळ यांच्या बाबतीत काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, सध्याच्या प्रकरणात पक्षाने वेगळी भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आपली बाजू मांडली आहे. काही व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने एकत्र करून सादर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी झिरवळ यांना अधिकृत तक्रार करण्याचा सल्ला दिला असून, व्हिडीओंची सत्यता तपासली जाईल असे सांगितले आहे. या प्रकरणात योग्य ती चौकशी करूनच पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांचे अशोक खरात प्रकरणावरही भाष्य याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरणावरही भाष्य करत कडक भूमिका घेतली आहे. कोणत्याही व्यक्तीचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, पीडित महिलांचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणात गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांना कायद्याला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला आहे.
विभागीय आयुक्त तथा महानगर आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सिडको वाळूज नगर-३ विकास योजनेतील प्रस्तावित ग्रोथ सेंटरमधील जमीन संपादनासाठी टीडीआर (Transferable Development Rights) आणि सर्वसमावेशक आरक्षण (Inclusive Reservation) या पर्यायांचा अवलंब केला जाईल, असे स्पष्ट केले. रामराई शिवारात आयोजित बैठकीत श्री. पापळकर यांनी ग्रोथ सेंटर परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गेल्या ३५ वर्षांपासून रखडलेल्या जमीन संपादन प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी बाजारभावानुसार रोखीने मोबदला देण्याची मागणी केली. मात्र, सध्याच्या परिस्थितीत प्राधिकरणाला रोख मोबदला देणे शक्य नसल्याचे पापळकर यांनी स्पष्ट केले. जमीन संपादन टीडीआरच्या माध्यमातून केले जाईल, असे त्यांनी सांगितले. सर्वसमावेशक आरक्षण या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा विकास करण्याची संधी मिळेल. प्राधिकरणाची परवानगी घेऊन शेतकरी ग्रोथ सेंटरमध्ये विकासकामे करू शकतील, असेही श्री. पापळकर यांनी नमूद केले. मुंबई महानगर प्रदेशात राबवल्या जाणाऱ्या पास थ्रू (PPP) मॉडेलचा संदर्भ देत, खाजगी विकासकांनी जमीन संपादन व विकासासाठी पुढाकार घेतल्यास आणि शेतकऱ्यांची संमती असल्यास हा पर्यायही विचारात घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. यासाठी शासनाची मान्यता घेण्यात येणार आहे. ग्रोथ सेंटरमधील ३० मीटर रुंदीच्या प्रमुख रस्त्यांसाठी जमीन संपादनाला प्राधान्य दिले जाईल. शेतकऱ्यांची संमती मिळाल्यास मोजणी व टीडीआर प्रक्रियेला तातडीने सुरुवात केली जाईल. जमीन हस्तांतरणानंतर रस्ते विकासासाठी शासनाकडे निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही श्री. पापळकर यांनी सांगितले. वाळूज परिसरात अनधिकृत बांधकामे व लेआऊट होऊ नयेत, अन्यथा भविष्यात ती निष्कासित केली जातील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती प्राधिकरणाच्या अधिकृत ॲप किंवा व्हॉट्सॲप क्रमांकावर नोंदवावी, असे आवाहन विभागीय आयुक्त पापळकर यांनी केले. या बैठकीला महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, सह महानगर नियोजनकार रविंद्र जायभाये, सिडकोचे अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक १६ नितीन जाधव यांच्या न्यायालयाने नकली चलन प्रकरणात दोन आरोपींना दोषी ठरवले आहे. जमरूल उर्फ मणिरूल हुसेन आणि अजीम शेख यांना सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच प्रत्येकी ५०,००० रुपये दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास त्यांना अतिरिक्त सहा महिने शिक्षा भोगावी लागेल. हे प्रकरण २८ नोव्हेंबर २०२५ रोजी उघडकीस आले. त्यावेळी तहसील पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पथक गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, मेयो हॉस्पिटल जवळील गार्ड लाईन परिसरात दोन तरुणांकडे नकली नोटा आहेत. पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपी जमरूल उर्फ मणिरूल हुसेन आणि अजीम शेख (दोघेही रा. काली चौक, जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल) यांना ताब्यात घेतले. आरोपींची अंगझडती आणि बॅगची तपासणी केली असता, त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या एकूण २४३ नकली नोटा जप्त करण्यात आल्या. या नोटा हुबेहूब खऱ्या भारतीय चलनासारख्या दिसत होत्या, परंतु त्यात अनेक नोटांचे क्रमांक सारखेच होते. पंचांसमक्ष जप्ती पंचनामा तयार करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या नोटा नकली आहेत की खऱ्या, याची खात्री करण्यासाठी नाशिक येथील नोट छपाई प्रेसकडे अभिप्राय घेण्यात आला. अहवालात सर्व नोटा नकली असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस निरीक्षक रसूल शेख यांनी संपूर्ण तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले, ज्यात जप्ती पंच, चालू साक्षीदार आणि भारतीय चलनी मुद्रणालय प्रेसचा अहवाल हे प्रमुख पुरावे ठरले. सहाय्यक सरकारी वकील अॅड. अभय जिकार यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडत आरोपींना दोषी ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला. एमआयएम (MIM) पक्षाच्या सदस्यांनी प्रशासनावर 'हिटलरशाही'चा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यानंतर सभागृहातून सभात्याग केला. भाजप आणि शिवसेना सदस्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडल्यानंतर हा प्रकार घडला. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी प्रशासनाच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान घेतले जाते, त्याचप्रमाणे शहराच्या अस्मितेशी जोडलेल्या नामांतराच्या विषयावरही जनतेचे मत जाणून घ्यायला हवे होते. मुंबईत बसून दोन अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय संपूर्ण शहरावर लादणे, ही सरळ सरळ 'हिटलरशाही' आहे. एमआयएम सदस्यांनी मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, शहराला सध्या नाव बदलण्याची किंवा पुतळ्यांची नव्हे, तर चांगले दवाखाने, दर्जेदार शाळा, रस्ते आणि पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांची गरज आहे. प्रशासन भावनिक मुद्द्यांवर वेळ वाया घालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. सभेच्या सुरुवातीला 'उबाठा' (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सदस्यांनी पाणी योजनेच्या श्रेयावरून गोंधळ घातला होता. त्यानंतर नामांतराच्या मुद्द्यावरून एमआयएम सदस्यांनी सभागृह दणाणून सोडले. वारंवार सूचना देऊनही गोंधळ थांबला नाही आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने सभागृहात मोठी खडाजंगी झाली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीनंतरची पहिलीच सर्वसाधारण सभा वादाच्या भोवऱ्यात सापडली. पाणी योजनेच्या श्रेयावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या सदस्यांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. यामुळे महापौर समीर राजूरकर यांनी आक्रमक भूमिका घेत 'उबाठा'च्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच 'उबाठा' गटाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी शहराची पाणी योजना उद्धव ठाकरे यांनीच मंजूर केली आहे, त्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्याचा ठराव संमत करा, अशी मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. गटनेते गणेश लोखंडे, माजी महापौर रशीद मामू आणि सचिन खैरे यांच्यासह इतर सदस्यांनी सभागृहाच्या मध्यभागी येऊन गोंधळ घातला. महापौरांनी वारंवार सूचना देऊनही गोंधळ थांबला नाही. अखेर, मार्शलच्या मदतीने या सदस्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. सभागृहाबाहेर काढल्यानंतर या सदस्यांनी महापालिकेच्या पायऱ्यांवर बसून आणि परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. गोंधळामुळे सभेच्या सुरुवातीला व्यत्यय आला असला, तरी महापौरांच्या अध्यक्षतेखाली कामकाज पुढे सुरू झाले. या सभेत महात्मा बसवेश्वर पुतळ्याच्या वाढीव खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. टीव्ही सेंटर येथील मजनूहिल परिसरात बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी सुधारित आराखड्यानुसार खर्च १.४९ कोटींवरून २.६७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी खरेदी केलेल्या 'पॉटहोल पॅचिंग मशीन'साठी ७० लाख ८६ हजार रुपयांच्या वार्षिक कराराचा प्रस्तावही चर्चेला आला. या प्रस्तावावर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. मनपा आयुक्त जी. श्रीकांत आणि कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या बैठकीत शहरातील विविध रस्ते आणि चौकांच्या नामकरणाचा प्रस्तावही चर्चेला आला. प्रबोधनकार ठाकरे सभागृहात ११५ नगरसेवकांच्या उपस्थितीत ही सभा सध्या सुरू असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये स्थानिक प्रश्नांवरून मोठी चर्चा सुरू आहे.
हिंगोली जिल्ह्यात केवळ ध्वजवंदनासाठी येणाऱ्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या घेतलेल्या ऑनलाईन बैठकांचे गुपित कायम आहे. जे नाशिकला पोहोचले त्यांचीच कामे मंजूर झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली तसेच निविदा न काढलेली कामे तातडीने रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून नरहरी झिरवाळ यांची निवड झाल्यानंतर पहिल्याच दौऱ्यापासून ते वादग्रस्त ठरले आहेत. वसमत येथील पहिल्याच भेटीत त्यांनी मागास जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून निवड केल्याने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हिंगोली जिल्ह्यातील कार्यक्रमांनाही त्यांनी पालकमंत्री या नात्याने हजेरी लावलीच नाही. त्यामुळे त्यांची नाराजी उघड झाल्याचे दिसून आले. दरम्यान, हिंगोली मागास जिल्हा, गरिब जिल्हा असे वक्तव्य करून रोष ओढून घेणाऱ्या पालकमंत्री झिरवळांनी टिका होऊ लागलाच यु टर्न घेतला अन गरिब जिल्हयात विकास कामे करता येतील असे आपले म्हणणे होते असे सांगत आपल्या वक्तव्यावर पांघरून घातले. मात्र हिंगोलीत ध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थिती लावणाऱ्या पालकमंत्री झिरवळांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतलीच नाही. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सुमारे तीन बैठका त्यांनी ऑनलाईनच घेतल्या. या बैठकानंतर जे नाशीकला पोहोचले त्यांचीच कामे मंजूर झाली अन इतरांच्या कामांना मात्र नंतर पाहूत असे सांगत बाजूला केल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे हिंगोलीकरांच्या नाशीकच्या वाऱ्या चांगल्याच वाढल्या होत्या. तर काही तथाकथीत कंत्राटदार देखील कामांचे प्रस्ताव घेऊन स्वतःच नाशीककडे जाऊ लागले होते. त्यामुळे झिरवाळांच्या कार्यपध्दतीवर रोष व्यक्त होऊ लागला होता. पालकमंत्री तुपाशी अन अधिकारी उपाशी अशी म्हण शासकिय कार्यालयांमधून विशीष्ट आर्थाने बोलली जाऊ लागली होती. दरम्यान, पालकमंत्री झिरवाळांच्या कथीत व्हिडीओने राज्यभरात खळबळ उडाली असली तर त्यांच्या या अफाट कर्तृत्वाने हिंगोलीचे नांव मात्र लयाला गेले आहे. यामुळे जिल्हाभरातून आता पालकमंत्री झिरवाळ यांच्या कार्यपध्दतीवर टिका होऊ लागली आहे. जिल्हा नियोजन समितीची मंजूर झालेली अन ज्या कामांच्या निवीदा काढलेल्या नाहीत ती कामे रद्दच करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. सदर कामे रद्द केल्यानंतर ऑनलाईन बैठकीचे गौडबंगाल उघड होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयांमधून कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतर १३ जणांकडे गुटखा व तंबाखुच्या पुड्या आढळून आल्या आहेत. तर हे कर्मचारी कार्यालयात काम करीत असताना गुटखाचे सेवन करीत असताना आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्ह्यात गुटखा बंदी असतांनाही अनेक ठिकाणी गुटखा विक्री होत असल्याने पोलिस विभागाने पानटपऱ्यांची तपासणी करून कारवाई सुरु केली आहे. या कारवाईमुळे चोरून लपून गुटखा विक्री करणाऱ्या पानटपरी चालकांचे धाबे दणाणले आहेत. दररोज तीन ते चार ठिकाणी छापे टाकून गुटखा जप्त होत आहे. दरम्यान, गुटखा खाऊन शासकिय कार्यालयाचे कोपरे रंगत असल्याचे चित्र दिसू लागले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे यांच्या पुढाकारातून शासकिय कार्यालयातून तपासणी केली जात आहे. त्यानुसार जिल्हा सल्लागार डॉ. किरण लोंढे, कुलदीप केळकर, आनंद साळवे यांच्या पथकाने जिल्हा परिषद कार्यालयात तपासणी करण्यात आली. यावेळी पथकाने जिल्हा परिषद अंतर्गत विविध कार्यालयातून कर्मचाऱ्यांची तपासणी केली. यामध्ये १३ कर्मचारी गुटखा व तंबाखू खात असल्याचे आढळून आले आहे. तसेच त्यांच्याकडे गुटखा व तंबाखूच्या पुड्या देखील आढळून आल्या. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जिल्हयातील इतर शासकिय कार्यालयामधूनही लवकरच तपासणी मोहिम हाती घेतली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट् केले आहे. केंद्राने सद्यस्थितीवर भाष्य करताना लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जे लोक अशी अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. या प्रकरणी खोटी माहिती फेसबुक, एक्स किंवा इतर कोणत्याही समाज माध्यमावर टाकली किंवा व्हॉट्सएपच्या माध्यमातून फॉरवर्ड केली तरी तो गुन्हा ठरेल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नरहरी झिरवाळ व अशोक खरात प्रकरणातही चौकशी अंती ठोस कारवाई करण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी पेट्रोल - डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर भाष्य केले. ते म्हणाले, आखाती देशांतील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहे. यामुळे पेट्रोल - डिझेलचे दर वाढण्याची शक्यता होती. पण इंधन दरवाढीचा फटका सामान्य ग्राहकांना बसू नये म्हणून पेट्रोल - डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयांनी कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता कच्च्या तेलाच्या वाढलेल्या भावाचा परिणाम सरकारी तेल कंपन्या व भारत सरकार सहन करणार आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना आता अधिकच्या दरात पेट्रोल - डिझेल घ्यावे लागणार नाही. मी याविषयी भारत सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. विशेषतः ज्यावेळी आपल्या आजूबाजूंच्या देशांमध्ये जवळपास शटडाऊनची स्थिती ओढावली आहे. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आदी देशांतील लोकांनी गॅस व पेट्रोलच्या तुटवड्यामुळे जवळपास कार्यालये व संस्था बंद केल्या आहेत. अशावेळी भारताने अतिशय उत्तम मॅनेजमेंट करून आपल्याकडे पेट्रोल-डिझेलची कोणताही तुटवडा होऊ दिला नाही. घरगुती गॅसची कोणतीही कमतरता होऊ दिली नाही. पेट्रोल पंपांवर रांगा लावण्याची गरज नाही मी सर्व लोकांना विनंती करतो की, विनाकारण अफवेच्या आधारावर पेट्रोल - पंपांवर रांगा लावू नका. आपल्याकडे 1 महिन्याचा पेट्रोल - डिझेलचा पूर्ण स्टॉक आहे. पण विनाकारण रांगा लावून जास्तीचे पेट्रोल-डिझेल भरून घेतले तर त्यातून मागणी व पुरवठ्यावर ताण निर्माण होतो. कृत्रिम टंचाई निर्माण होते. अशा प्रकारची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून आपण नेहमी ज्या पद्धतीने पेट्रोल-डिझेल भरतो, तसेच पेट्रोल - डिझेल ग्राहकांनी भरावे, असे फडणवीस म्हणाले. केंद्राने लॉकडाऊन लागणार नाही हे जाहीर केले आहे. जे लोक अशी अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. अशा पद्धतीची खोटी माहिती फेसबुक, एक्स किंवा इतर कोणत्याही समाज माध्यमावर टाकणे किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सएपच्या माध्यमातून पुढे पाठवली तरी तो गुन्हा ठरेल. अशा गुन्ह्यांतील प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे मी सर्वांना स्पष्टपणे सांगतोय की, खोट्या अफवा पसरवू नका, नाही तर फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. नरहरी झिरवाळांनी संपर्क साधून स्थिती स्पष्ट केली मुख्यमंत्र्यांनी यावेळी मंत्री नरहरी झिरवाळांच्या व्हायरल व्हिडिओवरही भाष्य केले. नरहरी झिरवळ यांनी माझ्याशी फोनवरून संपर्क साधून हा व्हिडिओ 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे. मी त्यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी तत्काळ त्या संदर्भात एक तक्रार दाखल करावी. या व्हिडिओची शहानिशा केली जाईल. एकूण उद्भवलेल्या परिस्थितीची सत्यता पडताळून त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार व आम्ही योग्य तो निर्णय करू. मागच्या काळात जी घटना घडली त्याचे पूर्ण चौकशी झाली. त्याचा संबंध झिरवळापर्यंत आढळला नाही. पण आत्ता जी घटना घडली आहे, जे काही व्हिडिओ समोर आलेत. ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याची सत्यता पडताळणे अत्यंत गरजेचे आहे. ते जर सत्य असेल तर त्यावर योग्य ती कारवाई होईलच, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी भोंदू अशोक खरात प्रकरणातही व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. भोंदू अशोक खरातचे कुणासोबत फोटो किंवा व्हिडिओ येतात त्यावरून कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. त्यातील व्यक्तीचा प्रत्यक्ष सहभाग आहे का? हे महत्त्वाचे आहे. त्यात कुणाचा सहभाग असेल तर कारवाई होईल. नसेल तर केवळ फोटो आहे म्हणून कारवाई होणार नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की, या प्रकरणात कुणालाही सोडण्याचे कारण नाही. सरकार अतिशय खोलवर जात आहे. अनेक नव्या गोष्टी पुढे येत आहेत. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर होणार कारवाई अजून काही एफआयआर होण्याची शक्यता आहे. काही पीडित अजून पुढे येत आहेत. काही महिला पुढे येत आहेत. आर्थिक फसवणूक झालेल्या व्यक्तीही पुढे येत आहेत. त्यांचेही एफआयआर लवकरच पाहायला मिळतील. या प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ काही लोकांनी सोशल मीडिया साईटवर अपलोड केलेत. ते आम्ही काढून टाकलेत. पण ज्या - ज्या लोकांनी हे व्हिडिओ सोशल मीडिया साईटवर अपलोड केलेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. पीडितांना पूर्ण संरक्षण देण्यात आले आहे. यापुढेही ज्या महिला पुढे येतील त्यांना संरक्षण दिले जाईल. हे संरक्षण गोपनियतेचे आहे. काही जण ही गोपनियता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल, असे फडणवीस म्हणाले. संजय राऊतांच्या पक्षाकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सुंदोपसुंदी विशेषतः आदित्य ठाकरे व संजय राऊत यांच्यातील कथित वादावरही भाष्य केले. संजय राऊत यांचा पक्ष आता एवढा छोटा झाला आहे की, तिथे काय चालते त्याकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. त्यामुळे ते आपसात भांडो, मारामाऱ्या करो, एकमेकांच्या झिंज्या उपटो, एकमेकांचे कॉलर पकडो, त्यांचे त्यांना लखलाभ. आम्हाला महाराष्ट्र चालवायचा आहे, असे ते म्हणाले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्या संजय राऊतांनी पक्षासाठी अहोरात्र कष्ट केले, सर्वांच्या अंगावर गेले, त्यांच्याबद्दल जर पक्षात अशी भूमिका घेतली जात असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची नाराजी आणि २०२८ मध्ये संजय राऊत खासदार नसतील, अशा आशयाचे विधान आदित्य ठाकरे यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हस्के बोलत होते. ..तर हे त्या पक्षाचे दुर्दैव खासदार म्हस्के म्हणाले की, संजय राऊत यांनी कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत असतानाही पक्षासाठी काम करणे सोडले नाही. पक्षासाठी ते सर्वांशी भिडले. पण आज जर त्यांनाच बाजूला सारण्याची भाषा केली जात असेल, तर हे त्या पक्षाचे दुर्दैव आहे. चतुर्वेदींची तुलना राऊतांशी होऊ शकत नाही नरेश म्हस्के म्हणाले की, प्रियांका चतुर्वेदी असो किंवा इतर कोणी, त्यांची तुलना संजय राऊतांच्या संघर्षाशी होऊ शकत नाही. केवळ 'हाय-प्रोफाईल' लोकांसाठी जुन्या जाणत्या नेत्यांचा सन्मान राखला जात नसेल, तर उरल्या-सुरल्या शिवसैनिकांनी आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. पक्षासाठी झटणाऱ्या नेत्यांची किंमत नाही? नरेश म्हस्के म्हणाले की, आदित्य ठाकरे खरंच असं बोलले आहेत का? याचे उत्तर खुद्द संजय राऊतांनीच दिले पाहिजे. ज्या अन्यायाविरोधात एकनाथ शिंदेंनी बंड केले, तशीच वेळ आता राऊतांवर आली आहे का? असा खोचक सवालही म्हस्केंनी उपस्थित केला.आम्ही जेव्हा हे सर्व सांगत होतो, तेव्हा आमच्यावर टीका झाली. पण आज तेच चित्र पुन्हा दिसत आहे. पक्षासाठी झटणाऱ्या नेत्यांची किंमत उरली नसेल, तर ते चिंताजनक आहे. राऊत, आदित्य ठाकरेंत मतभेद - म्हस्के हक्काची जागा पवारांच्या झोळीत टाकल्याने पक्षात संतापाची लाट आहे. एकेकाळी ज्यांना जायचे आहे त्यांनी जा असे ठणकावून सांगणारे ठाकरे आता माझा तुमच्यावर विश्वास आहे अशी आर्जवाची भाषा वापरत आहेत. प्रियांका चतुर्वेदींच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात तीव्र मतभेद उफाळून आले आहेत. त्यांच्यात मोठी खडाजंगी आणि शाब्दिक चकमक झाल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. शरद पवारांसाठी जागा सोडल्याने चतुर्वेदी ठाकरेंसमोरच संतापल्या ऑपरेशन टायगर’च्या दहशतीखाली असलेल्या ठाकरे गटात आता अंतर्गत बंडाळीचा वणवा पेटला आहे. मातोश्रीवर पार पडलेल्या खासदारांच्या बैठकीत राज्यसभेच्या जागेवरून अभूतपूर्व हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ही जागा शरद पवारांसाठी सोडल्याने प्रियांका चतुर्वेदी यांनी थेट शड्डू ठोकला. आदित्य ठाकरेंच्या कार्यशैलीवर खासदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. बैठकीत प्रियांका चतुर्वेदी यांनी संजय राऊतांच्या भूमिकेवर थेट प्रहार केला. संजय राऊत यांनी पवारांचे नाव का घेतले? मला माझा तीव्र निषेध नोंदवायचा आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावर उद्धव ठाकरे यांनी “पक्षप्रमुख मी आहे. निर्णय माझाच असेल,’ असे सुनावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, वादाची ठिणगी अधिकच भडकली. मराठवाड्यातील एका खासदाराने, चतुर्वेदींना 6 वर्षे संधी देऊन पक्षाला काय फायदा झाला? असा बोचरा सवाल केला.
केवळ चोरीच्या संशयावरून आई-वडिलांनी आपल्या पोटच्या 2 मुलींना रात्रभर उलटे टांगून ठेवल्याची हृदयद्रावक, पण तेवढीच संतापजनक घटना सांगलीच्या आटपाडी तालुक्यात घडली आहे. या घटनेत एका 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून, दुसरीची प्रकृती चिंताजनक आहे. या चिमुकल्या रात्रभर पाणी - पाणी म्हणून तडफडत होत्या. पण त्यांच्या आई - वडिलांना त्यांची थोडीही दया आली नाही. यासंबंधीच्या वृत्तानुसार, आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात ही घटना घडली आहे. नाना हैबत यमगर असे आरोपी वडिलांचे, तर सानिका असे मृत मुलीचे नाव आहे. शेजाऱ्याच्या घरात चोरी केल्याच्या संशयावरून सानिकाच्या आई-वडिलांनी सानिका व तिची बहीण अनुजा या दोघींना बुधवारी रात्री 8 च्या सुमारास घरात उलटे टांगले होते. या निष्पाप मुली रात्रभर त्याच स्थितीत वेदनेने तडफडत होत्या. त्यांचा घसा कोरडा पडल्यानंतर त्यांनी आई-वडिलांकडे पाण्याची मागणी केली. त्या पाणी-पाणी म्हणून अक्षरशः ओरडत होत्या. पण जन्मदात्या आई-वडिलांच्या हृदयाला थोडाही पाझर फुटला नाही. मुलींच्या आजोबांवरही हल्ल्याचा प्रयत्न आरोपी पालक तसेच रात्रभर झोपी गेले. मुलींचे आजी-आजोबा घराबाहेर झोपले होते. रात्रभर झालेल्या वेदनांमुळे इवलुश्या सानिकाने जीव सोडला. त्यानंतर सकाळी 6 च्या सुमारास तिच्या आजोबांनी या दोघींना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावरच कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी मुलीजवळ जाऊन पाहिले असता त्यांना सानिका व अनुजा या दोघीही निपचित पडल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांनी त्यांना खाली उतरवून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे सानिकाला मृत घोषित करण्यात आले. असा झाला प्रकरणाचा भांडाफोड सानिकाचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपी नाना हैबत यमगर यमगर यांनी तिचा मृतदेह घरी आणला. त्यानंतर आपले भयंकर कृत्य लपवण्यासाठी आई-वडिल व काही नातेवाईकांनी मिळून सानिकाच्या मृतदेहावर गुपचूप अंत्यसंस्कार उरकण्याचा प्रयत्न केला. पण या प्रकरणाचा भांडाफोड गंभीर जखमी झालेल्या अनुजामुळे झाला. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अनुजा शुद्धीवर आली. तिने डॉक्टरांना आपल्या बापाने दिलेल्या अमानुष वागणुकीचा व सानिकाच्या मृत्यूचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. हे ऐकून डॉक्टरही सुन्न झाले. त्यांनी तत्काळ त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर या सैतानी कृत्याचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सोलापूर शहरातील बोरामणी नाका परिसरात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. ट्रक आणि मोटरसायकलमध्ये झालेल्या जोरदार धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका गंभीर होता की, दोघांनाही कोणतीही मदत मिळण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांची ओळख सैपन पटेल आणि हुजूर पटेल अशी झाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक आणि दुचाकी यांच्यात जोरदार टक्कर झाली आणि त्यानंतर दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यातील दृश्ये अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान, अशाच प्रकारचा आणखी एक अपघात सातारा जिल्ह्यातील म्हसवडजवळ घडला. पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. धुळदेव गावाच्या हद्दीत अर्धवट रस्त्याच्या कामामुळे वाहन चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. साताऱ्यातील या रस्त्याच्या कामाबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असून, त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. शेकडो निष्पाप नागरिकांचे जीव या रस्त्यावर गेले असून, प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पैसे परत मागितल्यामुळे मारहाण दरम्यान, नाशिकमध्येही एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेकडून लाखो रुपये उकळल्यानंतर संशयितांनी तिलाच बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शिवाजीनगर परिसरातील या प्रकरणात महिलेने पैसे परत मागितल्यामुळे तिला मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या तिन्ही घटनांमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असून, पोलिसांनी सर्व प्रकरणांचा तपास सुरू केला आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात 10 रुपयांची केलेली कपात ही शुद्ध धूळफेक असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सरकारने पेट्रोल - डिझेलवरील उत्पादन शुल्कात केलेली 10 रुपयांची कपात शुद्ध धूळफेक आहे. या कर कपातीचा देशातील जनतेला काडीचाही फायदा होणार नाही, असे ते म्हणालेत. मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी 10 रुपयांची कपात केली आहे. हे नवीन दर तत्काळ लागू झालेत. सरकारी तेल कंपन्या पेट्रोलवर 24 रुपये व डिझेलवर 30 रुपये प्रति लिटर तोटा सहन करत आहेत. त्यामुळे त्या इंधन दरवाढीचा विचार करत होत्या. पण सरकारने ऐनवेळी कर कपात करून या कंपन्यांना दिलासा दिला आहे. पण विरोधकांनी सरकारच्या या कर कपातीचा देशातील सर्वसामान्य जनतेला काडीचाही फायदा होणार नसल्याचा दावा केला आहे. सरकारने निवडणुकीमुळे रचला खेळ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची करकपात ही शुद्ध धूळफेक असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात 10 रुपयांची केलेली कपात म्हणजे शुद्ध धूळफेक आहे. ही कर कपात नागरिकांसाठी नव्हे, तर इंधनाचे मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांसाठी करण्यात आली आहे. या कर कपातीचा देशातील जनतेला काडीचाही फायदा होणार नाही. 4 राज्यांमध्ये होऊ घातलेला विधानसभा निवडणुकीमुळे सरकारने हा खेळ रचला आहे. अन्यथा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत 60-70 डॉलर प्रतिबॅरल असताना, काँग्रेसच्या पुण्याईने इराण व रशियाकडून सर्वांत स्वस्त दरात कच्चे तेल मिळत असताना केंद्र सरकारने कर कमी केला असता. पण सरकारने स्वस्त इंधनाचा फायदा जनतेला न देता प्रचंड कर लावून जनतेची लूट सुरू ठेवली. मोदीजींच्या कृपेने त्यांच्या उद्योगपती मित्रांची नफेखोरी सुरू राहिली. आता युद्धजन्य परिस्थितीमुळे मोदीजींच्या उद्योगपती मित्रांना तोटा होत आहे, म्हणूनच या मित्रांच्या कंपन्यांवरील करात कपात करण्यात आली आहे, असे ते म्हणालेत. राज्यांवर व्हॅट कमी करण्याचा दबाव केंद्राने उत्पादन शुल्कात मोठी कपात केल्यानंतर आता राज्य सरकारांवरील आपला व्हॅट कमी करण्याचा दबाव वाढला आहे. राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली, तरच पेट्रोल पंपांवर ग्राहकांना 2 ते 5 रुपयांची थेट सवलत मिळू शकणार आहे. हे ही वाचा… सरकारने पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटी 10-10 रुपये घटवली:क्रूड महागल्याने कंपन्या दर वाढवू शकत होत्या, हे रोखण्यासाठी घेतला निर्णय सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी 10 रुपयांची कपात केली आहे. पेट्रोलवरील शुल्क 13 रुपये प्रति लिटरवरून 3 रुपये करण्यात आले आहे, तर डिझेलवरील शुल्क 10 रुपयांवरून शून्य करण्यात आले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. अमेरिका-इस्रायलसोबत इराणच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 73 डॉलरवरून वाढून 105 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत. यामुळे तेल कंपन्यांना तोटा होत होता. तोटा भरून काढण्यासाठी तेल कंपन्या दर वाढवू शकल्या असत्या. उत्पादन शुल्क कमी करून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. कपातीचा परिणाम 7 प्रश्नांच्या उत्तरांमधून समजून घ्या…
शब्दाला जागला हार्दिक पांड्या!
मुंबई : क्रिकेटच्या मैदानात षटकारांचा पाऊस पाडणारा हार्दिक पांड्या सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या विजयानंतर हार्दिकने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीने सिद्ध केले आहे की, तो केवळ एक अष्टपैलू खेळाडूच नाही, तर शब्दाला जागणारा माणूसही आहे. वानखेडे स्टेडियमच्या त्या पडद्यामागच्या नायकांसाठी हार्दिकने आपले वचन पूर्ण करत एक खास भेट दिली आहे. टी-२० वर्ल्डकपच्या […] The post शब्दाला जागला हार्दिक पांड्या! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे पुढील 2-3 दिवसांत सर्वच लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 अर्थसहाय्य जमा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. या माध्यमातून महिलांचे सशक्तीकरण साधण्याचा सरकारचा हेतू आहे. गत अनेक दिवसांपासून फेब्रुवारी महिन्याचा लाभ केव्हा मिळणार? असा सवाल महिला वर्गातून केला जात होता. त्यानुसार, आता फेब्रुवारीच्या निधी वितरणासाठी आवश्यक असलेली तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता प्रत्यक्ष रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काय म्हणाल्या मंत्री अदिती तटकरे? मंत्री अदिती तटकरे याविषयी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील 2-3 दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे. महिलांना मोठा आर्थिक दिलासा उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना या योनजेमुळे मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मिळणारा हा सन्मान निधी त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयुक्त ठरत आहे. अनेक लाभार्थी महिलांनी या योजनेवर समाधानही व्यक्त केले आहे. शासनानेही लाभार्थ्यांना याविषयी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आधारशी संलग्न असणे आवश्यक असून, खात्याचा तपशीलही अचूक असणे अनिवार्य आहे. या प्रकरणी कोणतीही अडचण आल्यास संबंधित बँक किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही. ते महिलांच्या सन्मान आणि स्वावलंबनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सरकारचे मत आहे. येत्या काळातही ही योजना अधिक प्रभावीपणे राबवली जाईल आणि राज्यातील महिलांच्या विकासासाठी नवीन उपक्रम हाती घेतले जातील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशोक खरातच्या पापाचा पाढा वाचला जात आहे. यातच अनेक राजकीय नेत्यांचे खरात सोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहे. यातच आता नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे हे या भोंदूबाबासमोर हात जोडून बसल्याचे आणि खरात त्यांचे भविष्य सांगत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. महिलांच्या शोषणाचे आरोप असलेल्या या बाबाचे राजकीय धागेदोरे आता चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे व्हिडिओमध्ये? व्हायरल होत असलेल्या या चित्रफितीत अशोक खरात हा एखाद्या सिद्ध पुरुषाप्रमाणे माजी खासदार हेमंत गोडसे यांचा हात पाहून त्यांच्या आगामी काळातील घडामोडींवर भाष्य करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, खरात सांगत असलेले भविष्य गोडसे अत्यंत गंभीर मुद्रेने आणि श्रद्धेने ऐकत असल्याचे चित्रात स्पष्ट होत आहे. महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप असलेल्या अशा व्यक्तीच्या संपर्कात बडे लोकप्रतिनिधी असल्याने आता जनमानसातून संताप व्यक्त होत आहे. हा व्हिडिओ लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आपल्या राजकीय भविष्याबद्दल आणि निवडणुकीतील यशापयशाबद्दल खात्री करून घेण्यासाठीच गोडसे यांनी या भोंदूबाबाच्या दरबारात हजेरी लावली होती का? अशी चर्चा आता सर्वत्र रंगली आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कोणत्या ठिकाणचा आणि कधीचा आहे, याबाबत गोडसे यांच्याकडून किंवा प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. खरात आधीच घ्यायचा ग्राहकांची माहिती तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात आपल्या ग्राहकांविषयी आधीच माहिती गोळा करत होता. त्यासाठी त्याने स्वतंत्र नेटवर्क तयार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ग्राहक कोण आहे, त्याचे नातेवाईक कोण, आयुष्यातील समस्या काय आहेत, मित्र-शत्रू कोण-अशा अनेक गोष्टींची माहिती आधीच मिळवून तो लोकांसमोर अचूक भविष्य, सांगत असे. त्यामुळे लोक त्याच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवत आणि त्याच्या जाळ्यात अडकत. खरातचा HIV रिपोर्ट समोर तपासादरम्यान अशोक खरातची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यासाठी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. या तपासणीमध्ये विविध चाचण्या करण्यात आल्या असून, त्यात HIV चाचणीचाही समावेश होता. पोलिसांनी पीडित महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्याच्या उद्देशाने ही तपासणी केली होती. आता समोर आलेल्या अहवालानुसार, अशोक खरातचा HIV टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कुणावरही जबरदस्ती केली नाही- खरात तपासादरम्यान अशोक खरातने केलेला सर्वात वादग्रस्त दावा म्हणजे महिलांसोबत केलेली कृती ही विधीचाच एक भाग असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याचबरोबर मी कुणावरही जबरदस्ती केली नाही असेही त्याने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मी लोकांचं भलं केलं, पण तेच माझ्यावर उलटलं, असे म्हणत त्याने आपल्यावरचे आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, आता मी फक्त माझ्या मेंदूचे ऐकेन, असेही तो म्हणाल्याची माहिती समोर आली आहे. या विधानांमुळे तपास यंत्रणाही सावध झाल्या आहेत.
भोंदू अशोक खरातला तब्बल 39 आमदार भेटून गेले, मग माझेच नाव का घेतले जाते? मी फक्त एकदाच ईशान्येश्वर मदिरात पूजा केली. त्यामुळे केवळ ओळख असल्यामुळे एका व्यक्तीविषयी काहीतरी बोलणे साफ चुकीचे आहे, अशा शब्दांत सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. दीपक केसरकर यांना भोंदू अशोक खरातशी असणाऱ्या त्यांच्या संबंधांवरून टीकेला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी उपरोक्त शब्दांत स्पष्टीकरण देत आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, मी देवभक्त आहे. मी न चुकता शिर्डीला येतो. ते जे ईशान्येश्वर मंदिर आहे, ते शिर्डीच्या येण्याच्या रस्त्यात आहे. मी लहान असल्यापासून दर सोमवारी दर्शनासाठी शिव मंदिरात जातो. शिर्डीला आल्यानंतर कोणत्या महादेव मंदिरात जायचे? तर मग ईशान्येश्वर मंदिरात जाणे झाले. त्या निमित्ताने अशोक खरातशी ओळख झाली. आता ओळख झाली म्हणजे त्याच्या कोणत्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असे नाही. त्याला वाचवण्यासाठी माझा एखादा फोन गेला असेल, तर मी दोषी आहे. पण त्याच्याकडून जे चुकीचे कृत्य घडले आहे, त्यासाठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे. खरातच्या भोंदूपणाची जराही कल्पना आली नाही पत्रकारांनी यावेळी दीपक केसरकर यांना अशोक खरातच्या भोंदूपणाविषयी तुम्हाला जराही कल्पना का आली नाही? असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले. मी मंत्री असतानाही येथे येत होतो तेच दुर्दैव आहे. पण तेव्हा माझ्यासोबत पोलिसही असायचे. त्यांनाही या गोष्टीची कल्पना नव्हती. अन्यथा त्यांनी मला सांगितले असते. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या काही भक्तांमध्ये अनेक शिक्षक होते. त्यांच्यासाठी मी खूप काम केले आहे. ते नेहमी मला सांगायचे की, तुम्ही शिक्षणासाठी जेवढे काम केले, तेवढे कोणत्याही शिक्षण मंत्र्यांनी केले नाही. मग त्यांना या गोष्टीची कल्पना असती तर त्यांनीही मला सावध केले असते. माझ्या खात्याशी खरातचा संबंध नव्हता केसरकर म्हणाले, अशोक खरातच्या वैयक्तिक जिवनाची कुणालाही काही कल्पना नाही. ईशान्येश्वराच्या भक्तीपोटी माझी त्यांच्याशी ओळख झाली. ओळख झाल्याचा एखादा फोटो निघाला तर त्याविषयी काहीही बोलणे चुकीचे आहे. एका वृत्तपत्रात असे छापून आले की, मी ऑफिसला जायचे की नाही हे ही ते मला सांगायचे. हे खूप चुकीचे आहे. श्रद्धा असते, पण अंधश्रद्धा कधीही नसते. माझ्या खात्याशी त्याचा काहीही संबंध नाही. माझी व त्यांची ओळख केवळ ईशान्येश्वर मंदिराच्या निमित्ताने झाली. ते महादेवाचे मंदिर आहे. त्यामुळेच मी तिथे गेलो. मुख्यमंत्रीही स्वतः येऊन गेले. अनेक मंत्री येऊन गेले. पण त्यापैकी कुणालाही या गोष्टीची सुतराम कल्पना नव्हती. अशी कल्पना असती तर आम्ही कुणीच त्या ठिकाणी गेलो नसतो. त्यांच्याशी कोणते संबंधही ठेवले नसते. त्यामुळे मला त्याच्या अघोरी पूजेची काहीही माहिती नाही. हे माहिती असण्याचे कोणते कारणही नाही. कारण मी एवढा वेळ त्याच्या संपर्कात राहिलो नाही. ईशान्येश्वरमध्ये फक्त एकदाच पूजा केली मी फक्त एकदा ईशान्येश्वरमध्ये पूजा केली. त्यानंतर कोणतीही पूजाअर्चा केली नाही. त्यामुळे केवळ ओळख असल्यामुळे एखाद्या व्यक्तीविषयी काहीतरी बोलणे साफ चुकीचे आहे. एवढे जण भेटून गेले, जवळपास 39 आमदार भेटून गेले. मग माझेच नाव का? हा प्रश्न मला पडला आहे, असेही दीपक केसरकर यावेळी बोलताना म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. शहरातील मुरेडोंगरी भागातील मोहनमळा परिसरात ही घटना घडली असून, सकाळी स्थानिकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे संपूर्ण कणकवली तालुक्यात भीतीचे आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुशांत दळवी यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची जखम आढळून आली आहे. ही जखम बंदुकीच्या गोळीमुळे झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी काही अंतरावर रक्ताचे डागही दिसून आले असून, त्यामुळे हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नेमका मृत्यू कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराचा ताबा घेत पंचनामा सुरू केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले असून, ते घटनास्थळी पुरावे गोळा करत आहेत. मृतदेहाची स्थिती आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता तपास यंत्रणा प्रत्येक शक्यता तपासत आहे. दरम्यान, सुशांत दळवी हे कणकवलीतील परिचित बांधकाम व्यावसायिक असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्ती, व्यावसायिक व्यवहार आणि अलीकडील घडामोडींचा पोलिसांकडून सखोल तपास केला जाण्याची शक्यता आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जाणार असून, घटनास्थळी कोणी संशयास्पद हालचाल केली का याचा शोध घेतला जात आहे. सध्या तरी हा प्रकार नेमका अपघात आहे की हत्या, याबाबत स्पष्टता आलेली नसली तरी डोक्यावरील जखम आणि रक्ताचे डाग यामुळे घातपाताचा संशय अधिक गडद होत आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून, पुढील काही तासांत या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेने कणकवली परिसर हादरून गेला असून, नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. कामगार नदीपात्राकडे जात असताना मृतदेह आढळला हा प्रकार जुन्या वैमनस्यातून झालेल्या खुनाचा असावा, अशी शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. मध्यरात्रीनंतर ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाजही वर्तवला जात आहे. शहरातील मुडेश्वर मैदानासमोरील गणेश नगर परिसरात एका ठेकेदाराचे कामगार नदीपात्राकडे जात असताना त्यांना वाटेत दळवी यांचा मृतदेह आढळला. त्यांनी तत्काळ याची माहिती कणकवली पोलिसांना दिली. प्राथमिक पाहणीत दळवी यांच्या डोक्याच्या मध्यभागी गोळी लागल्याचा संशय व्यक्त होत असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची साडेआठ लाखांची सायबर फसवणूक:गॅस पुरवठा खंडीत करण्याची दाखवली भीती
पुण्यात सायबर चोरट्यांनी गॅस पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची 8 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. कोथरूड परिसरात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील महात्मा सोसायटीत राहणाऱ्या 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक संदेश पाठवला. यामध्ये गॅस देयक थकीत असून, पुरवठा खंडित करण्यात येईल, अशी भीती दाखवण्यात आली. गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने ऑनलाइन पैसे पाठवण्याची बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवण्यात आली. ही लिंक उघडताच चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक करून त्याचा ताबा घेतला. सायबर चोरट्यांनी मोबाईल मधील सर्व डेटा ची माहिती घेतली असता त्यांना जेष्ठ नागरिकांच्या बँकेची देखील माहिती मिळून आली. मोबाईल क्रमांक बँक खात्याला जोडलेला असल्याने चोरट्यांनी बँक खात्यातून 8 लाख 51 हजार रुपयांची रक्कम दुसऱ्या खात्यात जमा करून घेतली. खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नागरिकांनी कोथरूड पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल माने पुढील तपास करत आहेत. चार दिवसांपूर्वी शिवाजीनगर भागातही गॅस पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून एका नागरिकाची 4 लाख रुपयांची फसवणूक झाली होती. गॅस किंवा वीज पुरवठा खंडित करण्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशा संदेशांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पुण्यात प्रवासी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू:बस चालक पसार, गुन्हा दाखल, पोलिस तपास सुरू
पुण्यात संगमवाडी येथील बस थांब्यावर एका खासगी प्रवासी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. रज्जू निषाद (वय 39, रा. छत्तीसगड) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. बुधारु रामजी निषाद (वय 35, सध्या रा. हिंजवडी) यांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. बुधारु हे मृत रज्जू यांचे भाऊ आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रज्जू निषाद हे संगमवाडी परिसरातून जात असताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर बस चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या निषाद यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पसार झालेल्या बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक एस. विभुते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. संगमवाडी परिसरात अनेक खासगी प्रवासी वाहतूकदारांचे (ट्रॅव्हल्स) थांबे आहेत. संगमवाडी ते येरवडा रस्त्यावर यापूर्वीही प्रवासी बसच्या धडकेत पादचारी आणि दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मोबाइलवरील गेम जिंकल्याने भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून फसवणूक दरम्यान, मोबाइलवरील गेम जिंकल्याने भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनकवडी भागात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मोबाइलवरील गेम जिंकल्याने महागडा मोबाइल आणि चामड्याची पिशवी अशा भेटवस्तू पाठवण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखवले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांखाली चोरट्यांनी त्यांना भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी पैसे घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एन. लोंढे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
भोंदू अशोक खरातने 50 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पण आता अभिनेत्री ममता कुलकर्णीने या पीडित महिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या महिला अशोक खरातकडे गेल्या, तेव्हा त्यांची बुद्धी कुठे गेली होती? त्यांना स्वतःची मर्यादा ठावूक नव्हती का? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. भोंदू खरातचे अनेक नेते व अधिकाऱ्यांशी साटेलोटे आढळले आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी प्रस्तुत प्रकरणात भोंदू खरातकडे जाणाऱ्या महिलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या महिला अशोक खरातकडे गेल्या तेव्हा त्यांची बुद्धी कुठे गेली होती? या सर्व महिला एवढ्या मूर्ख होत्या का? की अशोक खरात त्यांना स्पर्श करत असताना नक्की काय घडत आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही? एखाद्या व्यक्तीने त्यांना आपल्या बेडरूममध्ये बोलावले, तर त्या तिथे सरळ चालत जातील का? त्यामुळे या प्रकरणी त्यांचाही दोष आहे. आजच्या काळात धर्माच्या नावाखाली प्रत्येकानेच ढोंगाचा आधार घेतला आहे. मी स्वतः माझ्या शरीराला अत्यंत कठोर शारीरिक कष्टांच्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून काढून तपश्चर्या केली. पण आजकाल प्रत्येकजण धर्माच्या नावाखाली लोकांची लूट करत आहे. या तथाकथित धर्मगुरूंच्या भरवशावर राहणे थांबवा व तुमची भक्ती थेट ईश्वरावरच केंद्रित करा, असे ममता कुलकर्णी यांनी टीव्ही 9 शी बोलताना म्हटले आहे. त्यांना स्वतःची मर्यादा माहिती नव्हती का? त्या पुढे म्हणाल्या, अशोक खरातला आपण अवतार असल्याचा भ्रम झाला आहे. त्याने त्या निर्दोष बायकांना फसवले. अशा महिलांच्या पतीने आपल्या पत्नीला समजून घेतले पाहिजे. हे नालायक लोक आहेत. तुम्ही त्या महिलांनाही विचारा. काय माहिती त्यांचाही त्यात सहभाग असू शकतो. मी तर त्या महिलांना दोषी मानत नाही. त्या निर्दोष आहेत. त्यांना क्षमा असावी. पण त्या खरातकडे ज्योतिषासाठी गेल्या होत्या की, अन्य काही करण्यासाठी गेल्या होत्या? त्यांना स्वतःची मर्यादा माहिती नव्हती का? तो मर्यादा ओलांडत होता तर त्यांनी त्याला लाथ घालून बाहेर पडण्याची गरज होती. त्याला फटके देण्याची गरज होती. हे तुम्ही काय करत आहात असा जाब विचारण्याची गरज होती, असे त्या म्हणाल्या. अशोक खरात 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत दुसरीकडे, नाशिक सत्र न्यायालयाने भोंदू अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे. खरात हा महिलांना एक विशिष्ट पाणी प्यायला द्यायचा. त्यानंतर तो आपण सिद्ध पुरुष असल्याचे सांगत त्यांच्यावर अत्याचार करायचा. त्याने 5 नरबळी दिल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. कारण, त्याच्या फार्महाऊसवर गोळीबार करण्यात आलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या आढळल्या आहेत. त्याने ही काडतुसे कुठे वापरलीत याचा तपास पोलिस करत आहेत.
नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. न्यायालयाने त्याला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, सध्या विशेष तपास पथक (SIT) त्याची सखोल चौकशी करत आहे. या तपासादरम्यान खरातने लोकांना फसवण्यासाठी वापरलेल्या युक्त्या आणि तंत्रांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, तो लोकांच्या मनाचा अभ्यास करून अगदी पहिल्या काही मिनिटांतच त्यांचा विश्वास जिंकत असे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात आपल्या ग्राहकांविषयी आधीच माहिती गोळा करत होता. त्यासाठी त्याने स्वतंत्र नेटवर्क तयार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ग्राहक कोण आहे, त्याचे नातेवाईक कोण, आयुष्यातील समस्या काय आहेत, मित्र-शत्रू कोण-अशा अनेक गोष्टींची माहिती आधीच मिळवून तो लोकांसमोर अचूक भविष्य, सांगत असे. त्यामुळे लोक त्याच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवत आणि त्याच्या जाळ्यात अडकत. यासाठी खरात ‘कोल्ड रिडिंग’ आणि ‘हॉट रिडिंग’ या दोन तंत्रांचा वापर करत होता. ‘हॉट रिडिंग’मध्ये ग्राहकाबद्दल आधीच माहिती मिळवून ती समोर मांडली जाते, तर ‘कोल्ड रिडिंग’मध्ये काही सामान्य प्रश्न विचारून समोरच्याच्या प्रतिक्रिया पाहून अंदाज बांधला जातो. मानसशास्त्र, चेहऱ्यावरील भाव (फेस रीडिंग) आणि संवाद कौशल्य यांचा वापर करून तो लोकांना भ्रमित करत होता. या तंत्रामुळे लोकांना तो खरोखरच चमत्कारिक असल्याचा भास निर्माण होत होता. दरम्यान, या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव पोलिस ठाण्यात राहुल शिंदे, योगेश आढाव आणि बीड जिल्ह्यातील संदीप गरजे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पीडित महिलांची ओळख उघड करणारे कोणतेही व्हिडीओ किंवा माहिती शेअर केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. प्रशासनाकडून शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया याशिवाय, तपासादरम्यान अशोक खरातकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्र परवान्याबाबतही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 15 ऑक्टोबर 2012 रोजी त्याला शस्त्र परवाना देण्यात आला होता आणि 1 जानेवारी 2024 रोजी त्याचे नूतनीकरण झाले होते. त्याच्या फार्महाऊसमधून 21 काडतुसे जप्त करण्यात आली असून त्यापैकी 5 वापरलेली असल्याचे आढळले आहे. या काडतुसांचा वापर नेमका कशासाठी झाला, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाकडून त्याचा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
पेट्रोल-डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठी आपल्याकडे आहे हे केंद्र सरकारने सांगितले आहे. विरोधक लोकांना पॅनिक करत जास्तीच इंधन खरेदी करण्यास भाग पाडत आहेत. संजय राऊतांनी सुद्धा सांगितले आहे की नॅचरल गॅसची पाईप लाईल असूनसुद्धा मला गॅस सिलिंडर हवे आहे, असे करत ते लोकांना पॅनिक करत आहेत, म्हणून आपण रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे,असे नवनाथ बन यांनी म्हटले आहे. हिंदुत्ववाद काय आहे हे राऊतांनी सांगू नये कारण ते काँग्रेसचे तीर्थ पित आहेत. तुम्ही काँग्रेसच्या तीर्थाचा विचार करा. नवनाथ बन म्हणाले की, खरात प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. खरातला बेड्या ठोकल्या आहेत, एसआयटीकडून चौकशी करण्यात येत आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. राऊतांकडून केवळ राजकीय धुळफेक करण्याचे काम सुरू आहे. राऊत कुणाची नावे घेत आहेत पण राऊतांच्या दबावाखालीच खरातच्या आश्रमाला पाणी दिले. ते कुणाच्या दबावाखाली दिले हे सरकारने सांगितले पाहिजे. देशात 2 महिने पुरेल इतका इंधनसाठा जनाब संजय राऊत हे अफवा पसरवत आहे, त्यामुळेच जनता पॅनिक होत रांगेत उभे राहू लागलेत. आपल्या देशात दोन महिने पुरेल इतका इंधनसाठा आहे. तर होर्मुझ खाडीतून इंधन आयात करण्यासाठी भारताला परवानगी आहे. भारताचा तिरंगा बघत आपली सर्व जहाजे सोडली जात आहे. संजय राऊतांकडून मु्द्दाम लोकांना पॅनिक करण्याचे काम सुरू आहे. त्यांना वाटते की देशामध्ये अराजकता निर्माण व्हावी. पण मोदींच्या सक्षम नेतृत्वात देशातील परिस्थिती खराब होणार नाही. राऊत लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नवनाथ बन म्हणाले की, हिंदुत्व आणि शिवसेनेसाठी आपला जन्म झाला असा दावा संजय राऊत करतात. तुमचे हिंदुत्व उरले कुठे तुम्ही सोनिया गांधी, राहुल गांधी यांची गुलामी करत आहात. नाव उद्धव ठाकरेंचे घेत राहुल गांधीचा प्रचार करण्याचे तुमचे काम सुरू आहे. खासदाराकी मिळावी यासाठी काँग्रेसचा अजेंडा रेटण्याचे काम तुम्ही करत आहात. हे आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी ओळखले आहे. काँग्रेसच्या सांगण्यावर ते अफवा पसरवत आहेत कारण त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा आहे. ते लवकरच काँग्रेस प्रवेश करतील. ठाकरे गटात अंतर्गत संघर्ष वाढला नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटात सध्या अंतर्गत संघर्ष वाढला असून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वातावरण तयार करण्याचे काम संजय राऊत करत आहेत. स्वतःची राजकीय स्थिती कमजोर होत असल्याने राऊत गटातून बदनामीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेसाठी राऊत कुठल्याही थराला जाऊ शकतात.
सांगली जिल्ह्यातील एका नामकरण सोहळ्यात खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये महिलांची वाढती उपस्थिती आणि भविष्यातील 33 टक्के महिला आरक्षण याचा उल्लेख करताना त्यांनी पुढील निवडणुकीत आपण खासदार राहू की नाही, याबाबत अनिश्चितता व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असतानाच राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत. खानापूर तालुक्यातील मौजे मेंगाणवाडी या गावाचे नाव बदलून ‘मौजे शिवशिवापूर’ असे करण्यात आले. या नामकरण सोहळ्यात विशाल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर तसेच काँग्रेसचे मनपा नगरसेवक हर्षवर्धन पाटीलही उपस्थित होते. या सोहळ्याला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती पुरुषांपेक्षा अधिक होती. याच मुद्द्यावर भाष्य करताना पाटील यांनी महिलांच्या वाढत्या सहभागाचे कौतुक केले. आपल्या भाषणात विशाल पाटील म्हणाले की, पूर्वी अशा कार्यक्रमांमध्ये महिलांची उपस्थिती कमी असायची, पण आता मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी होत आहेत. 33 टक्के महिला आरक्षणामुळे भविष्यात अधिक महिला आमदार आणि खासदार होतील. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत आम्ही असू की नाही, याची खात्री देता येत नाही. त्यांनी हे वक्तव्य हलक्या फुलक्या अंदाजात केल्याने सभागृहात हशा पिकला, मात्र या विधानामागे राजकीय वास्तवाची झलक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विस्ताराबाबतही भाष्य केले. मतदारसंघ खूप मोठा आहे. प्रत्येक गावात पोहोचणे शक्य होत नाही. सहा महिने एखाद्या गावात काम केलं, तरी पाच वर्षांत सर्व गावांपर्यंत पोहोचता येत नाही, असे ते म्हणाले. तसेच, मी दिल्लीतून आलो असून विश्वजित कदम यांच्या हेलिकॉप्टरमधून कार्यक्रमाला आला. पुढील लोकसभा निवडणुकीचा प्रचार मी आत्तापासूनच सुरू केला आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. सांगली मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजय 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी सांगली मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. त्या वेळी महाविकास आघाडीत जागावाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात वाद झाला होता. अखेरीस पाटील यांनी अपक्ष उमेदवारी देत चंद्रहार पाटील यांचा पराभव केला. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाला होता आणि प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. आता त्यांच्या ताज्या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माझ्यामध्ये आणि आदित्य ठाकरेंमध्ये कसले मतभेद आहेत, या बातम्या अत्यंत चुकीच्या आहेत. मी शिवसेनेमध्ये जन्मापासून आहे. पक्षात काही राज्यसभेचा खासदार होण्यासाठी मी आलो नाही, मंत्री होण्यासाठी आलो नाही. बाळासाहेबांचा विचार महाराष्ट्रात नेण्यासाठी काम करतो, मी स्वत:ला एक शिवसैनिक मानतो, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, एखाद्या पदाचा केव्हा तरी निरोप घ्यावा लागतो. त्यांची मानसिक तयारी आपण ठेवली पाहिजे. आम्हाला वाटले होते उद्धव ठाकरे अजून 15 वर्षे मुख्यमंत्री असावे पण तसे झाले नाही. आमच्या पक्षावर जे संकट आहे फोडाफोडीचे आमचा पक्ष वाढवण्याचे त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. उद्धव ठाकरे 2019 मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा ते आमदार नव्हते हे समजून घेतले पाहिजे. 2029 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मी उबाठा कधीही सोडणार नाही. हा सर्वपक्षीय अत्याचार संजय राऊत म्हणाले की, नामवंत लोकं बुआबाजीला प्रतिष्ठा देण्याचे काम करतात. सामान्य माणूस बुआबाजीला प्रतिष्ठा देत नाही. उद्योगपती, आमदार, खासदार, सत्ताधारी, मंत्री हे लोकं त्यांना प्रतिष्ठा देतात, ते पुजा आणि अघोरी कृत्य करतात. पण यासाठी एका पक्षाला दोष देऊन काही फायदा नाही, हा सर्वपक्षीय अत्याचार आहे. भोंदू गिरी, बुआबाजीवर मी कधी बोलत नाही संजय राऊत म्हणाले की, भोंदू गिरी, बुआबाजी यावर मी कधी बोलत नाही. राज्यकर्त्यांनी अशा भोंदू बाबाच्या नादाला लागू नये असे माझे मत आहे. सध्या दिसतंय की खरातला महान बनवण्यासाठी आताच्या सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षातील मंत्र्यांचा वाटा आहे. जे संविधानिक पदावर आहेत त्यांनी अशा गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे. आपण बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरता त्यांनी अशा भोंदूगिरीला नेहमीच दूर ठेवले आहे, असे म्हणत शिंदेंवर निशाणा साधला. रॉकेल हे अंधभक्तासाठी तीर्थच संजय राऊत म्हणाले की, आपल्या देशाचे जे मित्र होते ते मित्र आपण गमावले आहेत. अशावेळी मोदींना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावे लागत आहे. पण त्यासाठी 27 दिवस का लागले, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी मोदी चर्चा करत आहे. दुसरीकडे जनता रॉकेलच्या रांगेत उभी आहे. या बैठकीतून काय होणार याकडे पाहावे लागेल. 3 लीटर रॉकेल हे अंधभक्तासाठी तीर्थच आहे. ते काही सरकारवर टीका करणार नाही. देशावर ही अवकाळा मोदींच्या चुकलेल्या निर्णयामुळे आली आहे. दिल्लीत एक आठवड्याचा सुद्धा साठा नाही पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, खरात तर जेलमध्ये आहे, पण दुसरे कोणी महाराज असतील तर सरकारचा हात दाखवून राज्यात काय सुरू आहे हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेतले पाहिजे, असा उपहासात्मक टोला लगावला आहे. देशभरातील लोकं पेट्रोल-डिझेलसाठी रांगेत उभी आहेत, ही भीती मोदींनी निर्माण केली आहे. 3 लीटर रॉकेल देणार म्हणून लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. चीन-फ्रान्ससारख्या देशात साधारण 4 महिन्याचा पेट्रोल-डिझेल साठा आहे.आपल्याकडे दिल्लीत एक आठवड्याचा सुद्धा साठा नाही. हे जनतेला सांगू नये. केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केले ही चांगली गोष्ट आहे.
मध्य रेल्वेने रेल्वे भरतीच्या परीक्षेतून मराठी भाषा हद्दपार केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन मुंबईहून उत्तर प्रदेश व बिहारकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या जाऊ न देण्याचा इशारा दिला आहे. 2023 पर्यंत रेल्वेच्या परीक्षा मराठीत होत होत्या. मग आता अचानक रेल्वे प्रशासनाला मराठी माणसाच्या संयमाची परीक्षा का पाहायची आहे? असा खडा सवाल मनसेने या प्रकरणी रेल्वे खात्याला विचारला आहे. मनसेने गत काही दिवसांपासून रेल्वे विभागाविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दादर - रत्नागिरी ही पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्याचा इशारा दिला होता. ही रेल्वे 15-20 दिवसांत सुरू झाली नाही तर उत्तर प्रदेश व बिहारकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या जाऊ देणार नाही, असा इशारा मनसेने दिला होता. त्यानंतर आता राज ठाकरेंच्या या पक्षाने भरती प्रक्रियेतून मराठी हद्दपार केल्याच्या मुद्यावरून रेल्वे खात्यावर निशाणा साधला आहे. काय म्हणाले अमित ठाकरे? राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे या प्रकरणी म्हणालेत की, 2008 साली राज साहेबांनी व महाराष्ट्र सैनिकांनी रेल्वे भरतीमध्ये मराठी भाषेचा आणि भूमिपुत्रांचा हक्क मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला होता. त्यानंतर 2017, 2019 व अगदी 2023 पर्यंत या परीक्षा मराठीत होत होत्या. मग आता अचानक रेल्वे प्रशासनाला मराठी माणसाच्या संयमाची परीक्षा का पाहायची आहे? मध्य रेल्वे (Central Railway) प्रशासनाने 16 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या 'GDCE 01/2026' या अधिसूचनेत Computer Based Test (CBT) परीक्षेचे माध्यम केवळ 'हिंदी आणि इंग्रजी' ठेवले आहे. मराठी भाषेला या प्रक्रियेतून जाणीवपूर्वक हद्दपार करण्याचा हा घाट घातला जात आहे. रेल्वे प्रशासनाला आमचे काही थेट सवाल आमचा स्पष्ट इशारा आहे, त्वरीत या अधिसूचनेत बदल करून 'मराठी' भाषेचा सन्मानाने समावेश करा. अन्यथा, या अपमानाचा जाब विचारायला आणि मराठी कामगारांच्या हक्कासाठी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' मैदानात उतरेल. लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या मातीत मराठीचा अपमान आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, असे अमित ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे.
जळगाव मनपात ठाकरेंच्या शिवसेनेत पटेल अन् पाटलांचे पटेना:एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे टोकदार बाण
शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी टोकाला पोहोचली आहे. जिल्हाप्रमुखांनी गटनेत्यांवर गद्दारीचा आरोप केल्यानंतर शाब्दिक चिखलफेक सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी अन् मनपात आईची माघार घेऊन जिल्हाप्रमुखांनीच गद्दारी केल्याचा आरोप इब्राहिम पटेल यांनी केला. तर गटनेते पटेल यांनी संपर्क प्रमुखांना फोन करून स्वीकृतच्या प्रस्तावासाठी प्रत्येकी 20 लाखांची मागणी केल्याचा पलटवार जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी केला. महापालिकेत स्वीकृतनगर सेवकाच्या एका जागेसाठी ठाकरे गटाच्या दोन्ही गटांकडून वेगवेगळे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी इब्राहिम पटेल यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेत दिल्याने खळबळ उडाली. मात्र, पटेल यांनी हे सर्व दावे फेटाळून जिल्हाप्रमुखांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आम्ही पाच पैकी चार नगरसेवक एकत्र आहोत. गटनेता बदलण्यासाठी सर्व नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे उपस्थिती अनिवार्य असते. त्यामुळे माझ्यावर कारवाई होऊ शकत नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच मुंबईत जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे, अशी माहिती इब्राहिम पटेल यांनी दिली. पक्षादेश हाच महत्त्वाचा पक्षाचा गटनेता बदलाचा निर्णय पक्षप्रमुखांच्या मान्यतेने पक्षाच्या सचिवांनी दिला आहे. तसे पत्र विभागीय आयुक्तांकडे दिले आहे. गटनेता बदलाचा निर्णय आम्ही घेतला नसून पक्षाचा आदेश आहे. पटेल यांनी संपर्क प्रमुखांना फोन करून स्वीकृतचा प्रस्ताव देण्यासाठी प्रत्येकी 20 लाखांची मागणी केली आहे. ही गद्दारी नव्हेतर दुसरे काय आहे?- कुलभूषण पाटील, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट आम्ही गद्दारी केली नाही मी स्वीकृत सदस्याचा प्रस्ताव दाखल करून कोणतीही गद्दारी केलेली नाही. मी पक्षासोबतच आहे. जळगाव विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष कोण लढले? मनपा निवडणुकीत भाजप उमेदवारविरोधात आईचा अर्ज कोणी मागे घेतला? भाजप-शिवसेनेचे 12 नगरसेवक बिनविरोध कसे निवडून आले? हे तपासायला हवे. इब्राहिम पटेल, नगरसेवक, ठाकरे गट
आखाती देशांमधील युद्धामुळे देशभरात घरगुती व व्यावसायिक गॅसची टंचाईचे चटके बसत आहेत. गॅस एजन्सीबाहेर भर उन्हात रांगा लागल्या आहेत. ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने जिथे उपलब्धता आहे तेथील ग्राहकांनी 3 महिन्यात पीएनजी कनेक्शन घेण्याची सक्ती केली आहे. सोलापूर शहरात 30 हजार घरांना पाइपलाइनद्वारे घरगुती गॅस (पीएनजी) पुरवण्याच्या प्रकल्पाचे काम गेल्या 5 वर्षांपासून संथगतीने सुरु आहे. आयएमसी कंपनी आणि महापालिकेतील वादामुळे आतापर्यंत फक्त जुळे सोलापुरातील 550 घरांतपर्यंतच ही सुविधा पोहोचली आहे. मात्र आता केंद्राने कडक पाऊले उचलल्यामुळे कंपनीने पीएनजी कनेक्शन वाढवण्यासाठी धावधावा सुरु केली आहे. दरम्यान, शहरात एकूण 11 हजार घरांपर्यंत कनेक्शनचे पाईप व मीटर लावण्यात आले आहेत. पुढील 2 महिन्यात त्यापैकी 4 हजार घरांमध्ये गॅस जोडणी केली जाईल, असा कंपनीचा दावा आहे. सोलापूरमध्ये पीएनजी पुरवण्याचे काम चेन्नईच्या आयएमसी कंपनीला देण्यात आले. त्यांनी गेल्या 5 वर्षांत 30 पैकी 11 हजार घरांना मीटर लावले आणि फक्त 550 घरांपर्यंत गॅस पोहोचवला आहे. उर्वरित कामासाठी महापालिकेने आता परवानगी दिली आहे. त्यामुळे कंपनीनेही उर्वरित 29,450 घरांपर्यंत गॅस पोहचवण्याचे काम हाती घेतले आहे. 14 किलो एलपीजी 920 रुपयांना, तेवढाच पीएनजी फक्त 672 रुपयांत पीएनजी हा पाइपलाइनद्वारे घरगुती व औद्योगिक ग्राहकांना पुरवला जाणारा वायू आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी एलपीजीच्या तुलनेत हा गॅस स्वस्त मिळतो. या गॅससाठी प्रति क्यूबिक मीटर 48 रुपयांचा दर आकारला जातो. 14.2 किलोचे एक एलपीजी सिलिंडर 920 रुपयांना मिळते. तर तेवढाच पीएनजी वापरला तर फक्त 672 रुपयेच मोजावे लागतात. म्हणजे तुलनेने 248 रुपयांची बचत होते. त्यामुळे पीएनजीला मागणी वाढत आहे. मनपा व कंपनीच्या वादामुळे रखडले काम पीएनजी पाईपलाईन टाकण्याच्या कंपनीला खोदकाम करावे लागते. त्यासाठी मनपाची परवानगी घ्यावी लागते. या कामासाठी आयएमसी कंपनीने महापालिकेला 1 कोटी 25 लाख भरले होते. पण, कंपनीला वेळेत काम पूर्ण करता आले नाही. त्यामुळे मनपाने रस्ते खोदल्याप्रकरणी नोव्हेंबरमध्ये दंड केला. या वादामुळे कंपनीने डिसेंबरपासून काम बंद ठेवले होते. महापालिकेने आता पीएनजी जोडणीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे कंपनीने काम सुरु केले आहे. गेल्या महिनाभरात जुळे सोलापुरातील आणखी 50 घरांत पुरवठा सुरु केला. 2 महिन्यांत 4 हजार घरांपर्यंत गॅस पुरवण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. कंपनी म्हणते.. केंद्र सरकार सूचना देते पण प्रशासनाचे सहकार्य मिळत नाही पीएनजी गॅस पुरवठ्याच्या प्रकल्पाचे काम कुठपर्यंत आले आहे, याची माहिती घेऊन केंद्र सरकारकडून रोजच आढावा घेतला जात आहे. त्याबाबत आवश्यक त्या सूचनाही दिल्या जात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही मिशन मोडवर हे काम करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. शासन केवळ सूचना देते. मात्र प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य मिळत नाही. त्यामुळेच घरगुती गॅसच्या जोडणीत अडचणी येत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एलपीजी टंचाईमुळे मड्डी वस्तीतील गॅस एजन्सीसमोर रांगा. तर सुधीर एजन्सीसमोर 14 मार्चच्या बुकिंगचे वितरण सुरु असल्याचा फलक.
नाशिकमध्ये अंधश्रद्धा आणि अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून, सामाजिक आणि पोलिस यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची गती वाढवली आहे. दरम्यान, खरातच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर आला असून, त्यामुळे तपासाला नवी दिशा मिळाल्याचे मानले जात आहे. तपासादरम्यान अशोक खरातची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यासाठी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. या तपासणीमध्ये विविध चाचण्या करण्यात आल्या असून, त्यात HIV चाचणीचाही समावेश होता. पोलिसांनी पीडित महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्याच्या उद्देशाने ही तपासणी केली होती. आता समोर आलेल्या अहवालानुसार, अशोक खरातचा HIV टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट झाला असला, तरी गुन्ह्यांचे गांभीर्य मात्र कायम आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने महिलांना विविध आमिषे दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. भविष्य सांगण्याच्या नावाखाली किंवा घरातील अडचणी दूर करण्याचा दावा करून तो महिलांना विश्वासात घेत असे. काही प्रकरणांत भीती दाखवून, तर काही ठिकाणी संमोहनासारख्या पद्धतींचा वापर करून तो महिलांचे शारीरिक शोषण करत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. या संदर्भात अनेक महिलांनी पुढे येत पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे, तर काही महिला अजूनही भीतीमुळे समोर येण्यास कचरतात. आतापर्यंतच्या तपासात अशोक खरातने 150 हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा विचार करून न्यायालयाने त्याला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास अधिक सखोल करण्यासाठी आणि जास्तीत जास्त पीडित महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी ही कोठडी आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. SIT सध्या या प्रकरणातील सर्व पैलू तपासत असून, गुन्ह्यांची साखळी उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता याचबरोबर तपास यंत्रणा खरातच्या आर्थिक व्यवहारांवर आणि त्याला मदत करणाऱ्या व्यक्तींवरही लक्ष केंद्रीत करत आहेत. गुन्ह्यात वापरलेली ठिकाणे, आर्थिक देवाणघेवाण आणि संबंधित व्यक्ती यांचा शोध घेतला जात आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, राज्यभरात या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील देवी जगदंबा माता, संत सेवालाल महाराज, संत रामराव बापू मंदिर सेवा आश्रमात मयार्दा पुरुषोत्तम श्रीराम भगवान यांचा जन्मोत्सव पाळणा गीत, भोग भंडारा, आरदास व महाआरती करून लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जय श्रीराम, जय सेवालाल, जय रामराव बापू यांच्या नावाच्या जयघोषाने पोहरादेवी नगरी दुमदुमून गेली होती. देशभरातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान बहुजन, बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द येथे दरवर्षी रामनवमीनिमित्त यात्रा महोत्सव हर्ष उल्हासात साजरा केला जातो. यावर्षी गुरुवारी दि. २६ मार्च रोजी रामनवमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामनवमी दिनी मयार्दा पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्मोत्सव दुपारी १२ वाजता संत सेवालाल महाराज व जगदंबा माता मंदिरात महंत कबिरदास महाराज यांच्या हस्ते व संत डॉ रामराव बापू सेवा आश्रमात धर्मगुरू या बाबुसिंग महाराज व देवी बापू भक्त शेखर महाराज यांच्या हस्ते पाळणा, भोग भंडारा, आरदास व महाआरती करून लाखो सेवा भक्तांच्या साक्षीने साजरा करण्यात आला. रामनवमी यात्रा महोत्सवानिमित्त आदल्या दिवसांपासूनच श्रीराम जन्मोत्सव व देवी, संताचे आशीर्वाद व यात्रा महोत्सवासाठी देशभरातील महाराष्ट्र नव्हे कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली आदीसह लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. नांदेड, परभणी, मंठा, जालना आदीसह इतर भागातून पायदळ दिंडीद्वारे हजारो सेवा भक्त दर्शनासाठी दाखल झाले होते. मंदिर संस्थानच्यावतीने महंतांनी स्वागत करून सत्कार केला. या वेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, तेलंगणा व कर्नाटकचे आजी माजी मंत्री, समाजातील प्रतिष्ठीत नागरीक व मान्यवर यांनी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याला हजेरी लावून देवी जगदंबा माता व संताच्या समाधीस्थळी दर्शन घेतले. बारीने रांगेत उभे राहून हजारो भाविकांची दर्शन घेण्यासाठी गर्दी जमली होती. त्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने पोहरादेवीत समाज बांधवांच्यावतीने सामाजिक, सांस्कृतिक विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. यात्रा महोत्सवात प्रशासनाच्या वतीने विविध सुविधा यात्रा महोत्सवात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस अधिक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला होता. यात्रा महोत्सवात प्रशासनाच्या वतीने आरोग्य विषयक सुविधा, पिण्याचे आणि आदींची व्यवस्था केली होती. अनेक स्वयंसेवी संस्थांनी भाविक भक्तांना अन्नदान राबवून सेवा दिली.
तालुक्यातील कावसा बु. व कावसा खु. या गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध देशी-विदेशी दारूविक्री तसेच वरली (जुगार) अड्ड्यांविरोधात ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. गावातील सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या या अवैध धंद्यांवर तत्काळ बंदी घालून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांच्या निवेदनानुसार, कावसा बु. व कावसा खु. येथे काही व्यक्तींमार्फत बेकायदेशीररित्या दारू विक्री व वरली जुगार अड्डे चालविले जात असून त्यामुळे गावातील युवक मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहेत. याचा परिणाम म्हणून कुटुंबांमध्ये वारंवार वाद, भांडणे, मारहाण तसेच कौटुंबिक तणाव वाढत असून सामाजिक स्थैर्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांनी यापूर्वी ६ मार्चला १८ मार्चला ८ वाजेच्या सुमारास निला उमेश वानखडे या महिलेने पतीच्या व्यसनाला कंटाळून विहिरीत उडी घेतल्याची गंभीर घटना घडली. पोलिसांना फोनद्वारे माहिती देऊनही ठोस कारवाई होत नाही. बिट जमादार व ठाणेदारांना वारंवार माहिती देऊनही अवैध धंदे सुरूच आहेत. अवैध दारूविक्री व जुगार अड्ड्यांवर बंदी घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. अन्यथा १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला. निवेदनासोबत ग्रामपंचायत कावसा बु. व कावसा खु. यांचा दारूबंदी ठराव, महिला बचत गटाचा ठराव, ग्रामस्थांच्या सह्यांची प्रत, संबंधित एन.सी.ची नक्कल जोडली. निवेदनावर रमाई महिला संघ, त्रिरत्न प्रबोधन मंच, बुद्धविहार समन्वय महासंघ अकोला, राष्ट्रीय लोक आंदोलन आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. प्रकरणाची प्रत उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट, तहसीलदार अकोट व उपविभागीय अधिकारी अकोट यांना देण्यात आली. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य उषा वानखडे, सुमित्रा वानखडे, वेणू वानखडे, यमुनाबाई वानखडे, विशाखा वानखडे, पद्मा वानखडे, मनोरमा वानखडे, सुशीला पोहरकार, अलका वानखडे, अन्नपूर्णा वानखडे, दीपाली उमाळे समाजसेवक गजानन हरणे आदी निवेदन देताना उपस्थित होते.
अकोट तालुक्यातील उमरा परिसरात बहुतांशी शेतकरी उन्हाळी कांद्याची लागवड करतात. मात्र येथील कांदा टिकाऊ व चवदार असल्याने त्याला स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी असते. त्यामुळे शेतकरी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र गेल्या दोन दिवसात दिवसभर ढगाळ हवामान सकाळी दाट धुके पडत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कांदा पिकावर करपा, मावा, पिवळ्या, मानमोडी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कांद्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. कांदा पिकाला सुरूवातीच्या दिवसांत चांगला भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर केली. सुरुवातीच्या काळात चांगले वातावरण राहिल्याने कांद्याची वाढ जोमदार झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने कांदा पिकावर विपरीत परिणाम होऊन करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. कांद्याची पातही पिवळी पडू लागली. पिकांचे शेंडे जळाल्याप्रमाणे झाले आहेत. रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी औषधांची फवारणी करीत आहेत. बदलत्या हवामानामुळे उत्पादन तर कमी झालेच आहे. अशा परिस्थितीत सध्या बाजारपेठेत सुरू असलेल्या कांद्याच्या भावात चांगलीच घसरण झाली आहे. त्यामुळे गरजेनुसार विक्री केल्यास ८०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे कांदा विक्री लागत आहे. एकीकडे अस्मानी तर दुसरीकडे सुलतानी अशा दुहेरी संकटामुळे कांदा उत्पादकांचा खर्चाचा ताळमेळ बसणे अवघड झाले आहे. आधीच उत्पादनात घट अशा परिस्थितीमध्ये बाजारपेठ अथवा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने परिसरातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने कांदा पिकास अंशतः अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी सौरभ रंदे यांनी केली आहे. दहा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी वातावरण बदलामुळे कांदा पिकावर करपा, रोगांचा प्रसार झाला आहे. हे रोग मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. तसेच पुढील फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने कराव्या वरील फवारणी करून करपा, मर रोग आटोक्यात येऊ शकतो, असे मंडळ कृषी अधिकारी पवन सुलताने यांनी सांगितले.
नाशिकमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. सध्या विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, अशोक खरात याला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौकशीदरम्यान खरातने केलेले काही दावे अत्यंत धक्कादायक असून, स्वतःला वाचवण्यासाठी तो विविध कारणे देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान अशोक खरातने केलेला सर्वात वादग्रस्त दावा म्हणजे महिलांसोबत केलेली कृती ही विधीचाच एक भाग असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याचबरोबर मी कुणावरही जबरदस्ती केली नाही असेही त्याने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मी लोकांचं भलं केलं, पण तेच माझ्यावर उलटलं, असे म्हणत त्याने आपल्यावरचे आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, आता मी फक्त माझ्या मेंदूचे ऐकेन, असेही तो म्हणाल्याची माहिती समोर आली आहे. या विधानांमुळे तपास यंत्रणाही सावध झाल्या आहेत. दरम्यान, तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा खरातचा मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे. या मोबाईलमधील डेटा पुनर्प्राप्त (रिकव्हर) करण्याचे काम सुरू असून, त्यातून महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात नाशिकमधील सरकार वाडा पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल झाले आहेत. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास अधिक भक्कम करण्याचा SIT चा प्रयत्न आहे. यामुळे खरातच्या कथित गैरप्रकारांचा संपूर्ण तपशील उघड होण्याची शक्यता आहे. संस्थेची बँक खाती सील याचबरोबर खरातच्या शिवानिका संस्थेशी संबंधित आर्थिक व्यवहारांवरही तपास सुरू आहे. संस्थेची बँक खाती सील करण्यात आली असून, त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची चौकशी केली जात आहे. राज्यभरातील जमीन, घरे आणि दुकाने यांचा तपशील नोंदणी विभागाकडून मागवण्यात आला आहे. कोट्यवधी रुपयांची संपत्ती कशी जमवली याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक काम करत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत या तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. बंदुकीच्या परवान्याबाबतही चौकशी तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अशोक खरातकडे सापडलेल्या बंदुकीच्या परवान्याबाबतही चौकशी सुरू आहे. 2012 मध्ये मंजूर झालेला हा परवाना 2024 मध्ये नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली असून, त्यापैकी काही वापरलेली असल्याचे समोर आले आहे. या काडतुसांचा वापर नेमका कुठे आणि कशासाठी झाला याचा तपास सुरू आहे. दररोज समोर येणाऱ्या नव्या माहितीमुळे अशोक खरात प्रकरण अधिकच गंभीर होत असून, पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहर पोलिस दलातील क्युआरटीला (जलद प्रतिसाद पथक) कार्यरत एका ३२ वर्षीय जवानाने जवळ असलेल्या सर्व्हिस पिस्टलमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही घटना पोलिस आयुक्त कार्यालयाच्या तळमजल्यावरील क्यूआरटी जवानाच्या विश्रांती कक्षात घडली आहे. हा धक्कादायक प्रकार गुरूवारी (दि. २६) सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडला असून काही वेळातच समोर आला आहे. विजय दिलीपराव नागापुरे (३२, रा. धामणगाव काटसूर, ह. मु. प्रिया पार्क परिसर, अमरावती) असे मृतक पोलिस जवानाचे नाव आहे. विजय हे बारा वर्षांपुर्वी शहर पोलिस दलात रुजू झाले होते. २०२१ पासून ते क्यूआरटी पथकात कार्यरत होते. बुधवारी रात्री ते व त्यांचे सात सहकारी असे एकूण आठ जण रात्रपाळीत ड्युटीला होते. गुरूवारी सकाळी उठल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांनी मुख्यालयाच्या मैदानावर व्यायाम केला तसेच क्रिकेटसुद्धा खेळले. त्यानंतर सर्व जवान पोलिस आयुक्तालयाच्या तळमजल्यावर उर्वरित. पान ४ विजय नागापुरे यांनी ज्या पिस्तुलातून गोळी झाडून घेतली. ते ग्लॉक्स ९ एमएम आहे. हे पिस्टल ऑस्ट्रीया आणि युएसए या देशामध्ये बनवले जाते. मुंबईतील २६ / ११ हल्ल्यानंतर राज्याच्या पोलिस दलातील फोर्स वन, क्यूआरटी जवानांना असे अद्यावयत शस्त्र देण्यात आले होते. या पिस्टलची विशेषत: म्हणजे त्याची ॲक्युरसी फार जास्त असून एकावेळी १५ राऊंड साठवता येवू शकते. तसेच जुन्या पिस्टलच्या तुलनेत ही वापरण्यासाठी अधिक सोईची व सोपी आहे. विजय यांनी याच पिस्टलातून एक गोळी फायर करुन घेतली आहे. विजय नागापुरे हे अविवाहीत आहेत. ते भावंडापैकी दुसऱ्या क्रमांकाचे असून श्याम थोरले आहेत. वयाने लहान असूनही विजय हे बारा वर्षांपुर्वीच तर मोठे बंधू श्याम तीन वर्षांपुर्वी पोलिसात लागले. विजय यांनी आत्महत्येपुर्वी चिठ्ठी किंवा मोबाईलवर मॅसेज लिहून ठेवला नाही, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान आर्थीक विवंचनेतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. त्यामुळे पोलिसांकडून त्यांची गुगल खात्याची हीस्ट्रीसुद्धा तपासली जाणार आहे. ^आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मात्र विजय नागापुरे यांना आर्थीक अडचण होती, अशी माहीती समोर येत आहे. त्याबाबतही सखोल तपास सुरू आहे. - गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त विजय नागापुरे आर्थीक विंवचनेतून निर्णय घेतल्याची चर्चा आत्महत्येसाठी वापरलेले पिस्टल प्रचंड अद्यावत पोलिस बंधूसोबत ९.११ वाजता शेवटचा कॉल विजय नागापूरे यांचे मोठे बंधू श्याम हे सुद्धा शहर पोलिस दलातील आरसीपीला कार्यरत आहेत. घटनेच्या काही वेळापुर्वीच सकाळी ९.११ मिनीटांनी त्यांचा श्याम यांच्यासोबत संवाद झाला. त्यावेळी ते दहा सेकंद बोलले, मी पेट्रोल भरण्यासाठी जातो असे विजय यांनी श्यामला सांगितले होते. तत्पुर्वीसुद्धा ते त्यांच्या इतर काही नातेवाईकांसोबत बोलले होते मात्र विजय असे काही पाऊल उचलणार असे बोलण्यातून जराही जाणवले नसल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आले आहे.
लॉकडाऊनबाबत पंतप्रधानांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे शहरातील इंधनाचा साठा संपुष्टात येईल या भितीपोटी वाहन चालक पेट्रोल, डिझेलने टँक फुल करीत आहेत. त्यामुळेच पेट्रोल पंपांवरील इंधनाच्या साठ्याचे नियोजन बिघडले आहे. अद्याप आम्ही दुचाकी, चारचाकी वाहनांना ठराविक पेट्रोल द्यायचे, असा निर्णय घेतला नसल्याचे अमरावती पेट्रोल-डिझेल डिलर्स असोसिएशनने स्पष्ट केले. काहीही असले तरी सलग दुसऱ्या दिवशी शहरातील पेट्रोल पंपांवर वाहन चालकांच्या लांबलचक रांगा लागल्याचे दिसून येत आहे. परिस्थिती लवकरच सामान्य होईल, असे सांगितले जात असले तरी ती नेमकी केव्हा नियंत्रणात येईल, ते सांगण्यास कोणीही तयार नाही. शहरातील २१ पैकी गुरुवारी रात्री ३ पेट्रोल पंप बंद पडले होते. सर्वसाधारण स्थितीत जिल्ह्यात दररोज ६० टँकरची मागणी असते. ती मागणी आता १५० टँकरपर्यंत वाढली आहे. एका टँकरमध्ये सरासरी १२ हजार लिटर पेट्रोल असते. ते बघता मागणी दुप्पटीहून जास्त वाढली आहे. उर्वरित. पान ४ चालक जास्तीचे इंधन भरताहेत ^शहरातील वाहन चालक इंधनाचा साठा संपेल या भितीमुळे पेट्रोल, डिझेल जास्तीचे भरत असून अनेकजण टँक फुल करीत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावरील स्टॉक नियोजन बिघडले आहे. कोणीही उगाच घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. - सौरभ जगताप, अध्यक्ष, पेट्रोल-डिझेल डिलर्स असोसिएशन.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी इतिहासाचा तेजस्वी अध्याय हा शहीद दिन (२३ मार्च) आहे. या दिवशी शहीद भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांनी आपल्या प्राणांची आहुती देत शोषणमुक्त समाजव्यवस्थेचा मार्ग दाखविला. आदी अनेक विचार निबंध स्पर्धेच्या पुरस्कार वितरणादरम्यान पुढे आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. एम. एस. दास होते. तर अतिथी म्हणून नगरसेविका सुमती ढोके, कुबेटकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली घाटोळ, छाया वानखडे, जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश गावंडे, संजय गुल्हाने, राजीव गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद चौधरी, राधाकृष्ण विद्यालयाचे संस्थापक सतिष माहोरे आदी उपस्थित होते. शहीद दिनानिमित्त आयोजित या निबंध स्पर्धेचा समारोपीय कार्यक्रम महावीरनगर येथील कालिका क्रीडा मैदानावर सायंकाळी पार पडला. “महान क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांचे जीवन व कार्य” या विषयावर घेण्यात आलेल्या या निबंध स्पर्धेला शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी आपल्या लेखनातून देशभक्ती, सामाजिक जाणीव, अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि समताधिष्ठित समाजव्यवस्थेची आकांक्षा प्रभावीपणे मांडली. अनेक विद्यार्थ्यांनी शहीदांच्या विचारांचे सखोल विश्लेषण करत आजच्या सामाजिक परिस्थितीशी त्यांची सांगड घातली. स्पर्धेमध्ये ३८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व शंभर विद्यार्थ्यांना मेडल देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित परीक्षक कपिल शृंगारे यांनी आपल्या मनोगतातून शहीदांच्या त्याग, धैर्य व राष्ट्रनिष्ठेचा गौरव केला. तसेच क्रांतिकारी गीत सादर केल्याने वातावरण क्रांतीमय झाले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन नवजागरण मनीषी व क्रांतिकारी स्मरण समिती यांच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान अशा आयोजनाला सदैव मदत करणारे समितीचे अभिजित भोजे व समितीच्या कार्यक्रमासाठी आपली जागा उपलब्ध करून देणारे इंद्रजित नागदिवे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व त्यांच्या बलिदानाला अभिवादन करून क्रांतिकारी घोषणा देत करण्यात आली. संचालन समितीचे अध्यक्ष गणेश मुंधरे यांनी केले. प्रास्ताविक समितीचे वरिष्ठ सदस्य सूरज मोने यांनी केले.
परिसरात वाढत्या प्रदूषणाच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या वडगाव माहोरे येथील नागरिकांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत स्टोन क्रशर व आरएमसी प्रकल्पाविरोधात चक्काजाम आंदोलन केले. धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. गिट्टी, मुरूम वाहतूक करणारी सर्व वाहने यावेळी रोखण्यात आली होती. यामुळे बराच वेळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. शेवटी एसडीओ अनिल भटकर यांनी घटनास्थळी पोहोचून कारवाईचे आश्वासन देत नागरिकांना आश्वस्त केले. अठरा फेब्रुवारी रोजी पालकमंत्र्यांच्या तक्रार निवारण मेळाव्यात सादर केलेल्या निवेदनाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला होता. आरोग्याशी तडजोड नाही' अशी ठाम भूमिका घेत नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे प्रमुख संजय पाटील आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान स्टोन क्रशर व आरएमसी प्रकल्पाने प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे सातत्याने उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. यावर तातडीने कारवाई करत संबंधित प्रकल्प बंद करण्याचा प्रस्ताव मुंबई मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. अमरावतीचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) अनिल भटकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. प्रदूषण विभागाने दाखवलेल्या नियमभंगाच्या आधारे विभागामार्फत स्टोन क्रशर व आरएमसी प्रकल्प बंद करण्याचे परिपत्रक काढले जाईल,' असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. तसेच, नांदगाव पेठ पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिनेश दहातोंडे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत नागरिकांच्या बाजूने उभे राहण्याचे आश्वासन देत प्रकल्प बंद करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधला जाईल, असे स्पष्ट केले. या आंदोलनात अमरावती महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुरेखा लुंगारे यांच्यासह वडगाव माहोरे येथील युवा नेते अक्षय चव्हाण, प्रशांत किटूकले, ऋषी पडोळे, राहुल नेमाडे, चंद्रशेखर दारोकार, नंदू गौरकर, हरीश मेश्राम यांच्यासह भवानी परिसरातील शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाच्या आश्वासनांनंतर आंदोलन केले स्थगित प्रशासनाकडून मिळालेल्या ठोस आश्वासनांनंतर नागरिकांनी तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित केले असले तरी, जोपर्यंत प्रकल्प पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील,' असा इशारा आंदोलकांनी दिला.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे चांदूर बाजार तालुक्यात स्वागत करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कर्जमाफी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी आंदोलक शेतकऱ्यांची बियाणे आणि लाडू तुला करून गौरव करण्यात आला. बियाण्यांच्या तुलनेतून शेतीचे आणि शेतकऱ्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले, तर लाडू तुला करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमात अशोक नारायण तायडे यांची लाडूतुला करण्यात आली, तर दिलीपराव भाकरे यांची बिजतुला करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तुला करण्यात आलेले बियाणे विधवा महिलांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच जनार्दन राऊत यांना पूर्ण कपडे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी झालेल्या आंदोलनांच्या आठवणींना उजाळा दिला. उपोषण, मोर्चे आणि विविध आंदोलनांच्या माध्यमातून शासनापर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी केलेला संघर्ष आठवत अनेक शेतकरी भावूक झाले. “हा निर्णय आमच्या संघर्षाचा विजय आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या आंदोलनामुळेच शासनाला हा निर्णय घ्यावा लागला, असे सांगत त्यांचे आभारही मानले. तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुढेही अशीच एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. या कार्यक्रमाला चांदूर बाजारच्या नगराध्यक्ष मनिषा नांगलिया, चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती तसेच सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश देशमुख यांनी केले, तर सूत्रसंचालन सुनिल मोहोड यांनी केले. हा लढा इथेच संपलेला नाही, आता सुरु झाला ^शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, ही आमच्या लढ्यातील प्रमुख मागणी आहे. तसेच आज दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी झाली असली तरी जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, त्यांनाही दोन लाखांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही पुढेही प्रयत्नरत राहणार आहोत. - बच्चू कडू.
शहरातील आठवडी बाजार गल्लीबोळात भरत असून आठवडी बाजारातील ओटे मात्र रिकामे आहेत. शासनाने लाखो रु. खर्च करून हे ओटे बांधले. तरी त्याचा भाजी, फळे व इतर वस्तू विक्रेत्यांना कोणताही फायदा मिळेनासा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आठवडी बाजार हा मंगळवारीच भरत असतो. मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून आठवडी बाजारातील लहान-मोठ्या दुकानदारांना दुकाने लावण्याची नगरपालिकेने कोणतीच व्यवस्था केली नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत आठवडी बाजार हा चिखलात भरत होता. त्यामुळे बाजारात खरेदी करण्याकरिता आलेल्या ग्राहकांना व दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आठवडी बाजार चिखलात भरत असल्यामुळे स्थानिक पत्रकारांनी ही बाब उचलून धरली. त्यानंतर २०२४ मध्ये तत्कालीन आ. डॉ. अनिल बोंडे यांनी आठवडी बाजारातील ओटे बांधकामाकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी मोर्शी नगर परिषदेला प्राप्त करून दिला. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालीन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा दारुण पराभव झाला. अपक्ष निवडून आलेल्या आमदाराच्या कार्यकाळात मोर्शी नगरपालिकेच्या वतीने निविदा काढण्यात आली. आठवडी बाजारात सिमेंटचे ओटे व रस्ते तयार करण्यात आले. नगरपालिकेच्या बुद्धिमान अभियंत्याने आठवडी बाजारातील ओट्याची रचना केली होती. त्या अनुषंगाने आठवडी बाजारातील ओटे व सिमेंट रस्ते तयार करण्याचा कंत्राट संबंधितांना देण्यात आला होता. कंत्राटदारातर्फे आठवडी बाजारात मोठे-मोठे ओटे बांधून तयार करण्यात आले. शहरात भरणारा हा आठवडी बाजार मोठा असल्यामुळे तालुक्यातील तसेच मध्यप्रदेशातील अनेक मजूरवर्ग बाजारहाट करण्याकरिता येत असतात. आठवडी बाजारात दुकाने मांडण्याकरिता जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेक भाजीपाल्याचे दुकानदार आपली दुकाने गल्लीबोळात लावतात. बाजारातील ओटे उंची, आकाराने मोठे मागील पाच वर्षांपासून आठवडी बाजारातील एकाही दुकानदाराने आपली दुकाने ओट्यावर लावलेली दिसून येत नाहीत.कारण, बांधकाम करण्यात आलेले ओटे उंचीने व आकाराने मोठे असल्यामुळे दुकानदार व ग्राहकांना त्याचा त्रास होत आहे.परिणामी अनेक दुकानदार आपली दुकाने आठवडी बाजाराच्या दिवशी रस्त्यावर लावत असतात.
अघोरी विधी आणि फसवणुकीच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या भोंदू अशोक खरात याच्या कारवायांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) हेल्पलाईनवर तक्रारींचा अक्षरशः ओघ सुरू झाला आहे. अवघ्या काही दिवसांत शेकडो नागरिकांनी संपर्क साधत खरातने केलेल्या फसवणुकीची आणि अत्याचारांची माहिती दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, खरातने केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर राजकीय नेते आणि काही सेलिब्रिटींनाही कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती पुढे येत आहे. एसआयटीने माहिती संकलनासाठी दोन हेल्पलाईन क्रमांक जाहीर केल्यानंतर आतापर्यंत 100 हून अधिक फोन कॉल्स प्राप्त झाले आहेत. नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या भागांतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवल्या आहेत. विशेषतः अनेक महिलांनी पुढे येत खरातने अघोरी विधींच्या नावाखाली केलेल्या शोषणाबाबत माहिती दिली आहे. या तक्रारींमुळे तपासाला नवे धागेदोरे मिळत असून पोलिस अधिक पुरावे गोळा करण्याच्या तयारीत आहेत. तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने चमत्कारी रत्न आणि मौल्यवान खडे, देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली. बाजारात केवळ 50 रुपयांना मिळणारे खडे तो लाखोंच्या किंमतीत विकत असे. लोकांच्या अडचणी, भीती आणि भविष्याबाबतच्या चिंतेचा गैरफायदा घेत त्याने अनेकांना लाखो रुपयांचा फटका दिला. अशा प्रकारे शेकडो लोकांना गंडा घालून त्याने मोठी आर्थिक माया जमवली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे, खरातच्या जाळ्यात अनेक बडे राजकीय नेते आणि सेलिब्रिटी अडकले होते, अशी माहिती समोर आली आहे. राजकीय यश, पदोन्नती किंवा संकट टाळण्यासाठी अनेक जण त्याच्याकडे जात असत. अशा लोकांकडूनही त्याने मोठ्या रकमा उकळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे या प्रकरणाचे राजकीय परिणामही मोठ्या प्रमाणात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही काळापूर्वी अर्धांगवायूचा झटका दरम्यान, तपासादरम्यान खरातच्या आरोग्याबाबतही काही माहिती समोर आली आहे. काही काळापूर्वी त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. उत्तेजक औषधांच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सध्या त्याच्या शरीराच्या एका भागाची हालचाल मर्यादित असल्याचेही सांगितले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, वैद्यकीय अहवाल आणि आर्थिक व्यवहारांचा तपास अधिक सखोलपणे करण्याची तयारी तपास यंत्रणांनी सुरू केली आहे.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींनी भारावून मंत्री पंकजा मुंडे यांनी भायाळा गावातील कार्यक्रमात अत्यंत भावनिक भाषण केले. गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरू देणार नाही, ही शपथ मी त्यांच्या चितेवर घेतली आहे, असे सांगताना त्या भावूक झाल्या. माझ्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात घातले तरी तुमचे ऋण फेडता येणार नाही, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्ते आणि जनतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात उपस्थितांनाही भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर पंकजा मुंडे बीड दौऱ्यावर होत्या. दिवसभरात त्यांनी श्रीराम नवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली. त्यानंतर पाटोदा तालुक्यातील भायाळा गावात गणेशानंद गडावर आयोजित नारळी सप्ताह कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी आपल्या राजकीय आणि वैयक्तिक प्रवासातील अनेक अनुभव सांगितले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काही कार्यकर्त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतल्याची वेदनादायक बाब त्यांनी व्यक्त केली. तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की ते शब्दांत मांडता येणार नाही, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांना प्रतिसाद दिला. तसेच भगवानगड येथे उभारल्या जाणाऱ्या माऊली मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात देणगी देणाऱ्या भाविकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या पदराने दृष्ट काढत त्यांचा सन्मान केला. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी भविष्यातील आयुष्याबाबतही मोठं विधान केलं. राजकारण संपल्यानंतर मीही हरिभक्त पारायणात सहभागी होणार आहे, असे त्या म्हणाल्या. समाजात एकोपा आणि प्रेम टिकवण्याचं आवाहन करत त्यांनी उपस्थितांना एकमेकांच्या साथीनं राहण्याचा संदेश दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये वेगळीच भावना निर्माण झाली. धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दरम्यान, परळीतील काळाराम मंदिरात रामनवमी उत्सवातही पंकजा मुंडे सहभागी झाल्या. दुपारी बारा वाजता प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या वेळी त्यांनी स्वतः पाळणा हलवून अभिवादन केले. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजऱ्या झालेल्या या सोहळ्यात पंकजा मुंडे यांनी रामराज्याची संकल्पना परळीत साकारावी, अशी प्रार्थना व्यक्त करत धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
अवकाळीचा तडाखा:शेतकऱ्यांवर अवकळा; पापरी, वैराग, पानगाव भागात गारपीट, 15 मिनिटात पिके आडवी
जिल्ह्यातील पापरी, वैराग, पानगावसह अनेक गावांत बुुधवारी रात्री उशिरा झालेल्या सोसाट्याच्या वारा,अवकाळी पाऊस व गारांच्या माऱ्याने ऊस, केळी, आंबा या नगदी पिकांसह चारा पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. पापरी (मोहोळ) परिसरातील मका, गहू, हरभरा आदी ३६५ हेक्टर तर आंबा, केळी,पेरू आदी ९० शेतकऱ्यांचे फळबागांचे ६५ हेक्टरचे नजर अंदाज गुरुवारी समजून आलेले नुकसान असून यात माहिती उपलब्धते नुसार वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी बाधित शेतकरी वर्गातून होत आहे. गेली आठवडाभर तालुक्यात तापमान खूप वाढले होते, फेब्रुवारी अखेरीस तापमानाने चाळिशी गाठली होती,दिवसभर व रात्री उशिरापर्यंत प्रचंड उकाडा व पहाटे थंडी जाणवत होती. सायंकाळी ७ च्या सुमारास अचानक हवेत बदल झाला, विजांचा गडगडाट त्याचबरोबर सोसाट्याचा वारा सुरू झाला, त्यापाठोपाठ छोट्या छोट्या गारांचा तडतडाट सुरू झाला. अगदी १५/२० मिनिटात तो थांबला, मात्र पुन्हा रात्री १०.३० चे सुमारास पुन्हा सुरू झालेल्या पावसाने व गारपिटीने ऊस, केळीची पाने चिरली असून वाऱ्याने काढणीस आलेले गहू, चारा पिके असणारी मका, कडवळ ही पिके जमीनदोस्त झाली. पापरी | परिसरात बुधवारी रात्री झालेल्या गारपीटने द्राक्षे बागांना जोरदार फटका बसला असल्याचे दिसत आहे. बार्शी तालुक्यातील वैराग भागातील हात्तीज परिसरामध्ये केळींचे मोठे नुकसान झाले आहे.
भगवान श्री रामाचा जन्मोत्सव पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील विविध गावच्या राम मंदिरात मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. प्रतिवर्षीप्रमाणे श्री विठ्ठल सभामंडपामध्ये श्री रामनवमी जन्मोत्सव सकाळी १० ते १२ या वेळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विठ्ठलास सकाळी ११ महानैवेद्य नंतर पांढरा पोशाख, पागोटे व साखरेचा हार परिधान करून श्रींच्या अंगावर गुलाल टाकून दुपारी १२ वाजता राम जन्मोत्सव सोहळा पार पडला, या शिवाय ग्रामीण भागातही विविध गावात रामलल्लाचा जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला. श्री विठ्ठल सभा मंडपामध्ये श्रीराम जन्माचे विठ्ठल महाराज देहूकर फड (बिद्रीकर मंडळी) श्रीकांत महाराज पातकर, पंढरपूर यांचे श्री. रामनवमी जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले किर्तन झाल्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद म्हणून सुंठवडा वाटप करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या सन्माननीय सदस्या शकुंतला नडगिरे, सदस्य संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र. व्यवस्थापक संदेश भोसले, व कर्मचारी वृंद उपस्थित होते. याशिवाय, रामनवमी जन्मोत्सवा निमित्त श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्राच्या भोजनप्रसादामध्ये गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला होता. प्रतिनिधी | बार्शी श्रीराम नवमी निमित्त येथील श्रीराम मध्यवर्ती उत्सव समितीच्या वतीने गुरुवारी (दि.२६) सायंकाळी ५ वाजता भगवंत मंदिर मार्ग येथील पुरातन श्रीराम मंदिर येथून जय श्रीरामाच्या जयघोषात फुलांनी आकर्षकरित्या सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भगवान श्रीरामाची देखणी ९ फूट उंचीची भव्य उत्सव मूर्ती ठेवून शोभा यात्रेची सुरूवात केली. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य बार्शी कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विजय गरड पंचायत समिती उपसभापती संतोष निंबाळकर माजी नगरसेवक प्रशांत कथले शिरीष जाधव, नगरसेवक विजय राऊत, रवी राऊत, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे व श्रीराम नवमी मध्यवर्ती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास श्री राम मंदिर भगवंत मंदिर मार्ग येथून सुरू झालेली शोभायात्रा पुढे महाद्वार चौक, वीर सावरकर चौक, पटेल चौक, ऐनापुर मारूती चौक, आरएसएम हाईट, शिवाजी आखाडा, स्टँड चौक,पोस्ट चौक, मार्गाने मिरवणूक निघाली. पंढरपूर शहरातील महाद्वारात असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या वाड्यातील राम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या हस्ते श्रीराम, सीता यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याच बरोबर सुमारे १०० वर्षे जुन्या भडगावकर राम मंदिरात ही राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत रोज विविध भजन सेवा सुरू आहे, संध्याकाळी सात वाजता वेद पठण आणि आरती करण्यात येत आहे. गुरुवारी जन्मोत्सव निमित्त पुणे येथे वास्तव्यास असलेले वसंतराव खर्डीकर आणि विद्याताई खर्डीकर यांचे कीर्तन संपन्न झाले. आज शुक्रवारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राम भक्त रविकुमार कुलकर्णी यांनी दिली. शोभा यात्रेच्या अग्रभागी सुमारे ७ फुट उंचीची आकर्षक अशी रामभक्त हनुमानाची उत्सव मूर्ती ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आली होती. शोभा यात्रेचे हे पाचवे वर्ष असून शहरातील प्रमुख मार्गाने शिस्तबद्धरीतीने दोन रांगेमध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या शोभा यात्रेत रामभक्तानी पांढरा शर्ट व डोक्यावर भगवी टोपी तर महिलांनी पारंपरिक पोषाख साडी परिधान केली होती. ‘जय श्रीराम, हर हर महादेव, भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करीत शहरातील प्रमुख मार्गाने निघालेल्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले शोभायात्रा पाण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. श्रीराम व हनुमानाची उत्सव मूर्ती हे शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण होते. रामभक्तांना पांडे चौक येथे सरबताचे वाटप करण्यात आले.
समाजातील काही लबाड पुरुषांच्या फसवणुकीमुळे पुण्यात महिलांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली होती. आत्महत्या रोखण्यासाठी राहत्या घरात बालकाश्रम काढून गर्भवतींचे बाळंतपण आणि बालकांचा सांभाळ करुन आरोग्य सेवेचा नवआदर्श निर्माण केलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या ख-या वारसदार गाव खेड्यात काम करणा-या स्त्री परिचर आहेत. तीन वरुन ६ हजाराचे मानधन झाले याचा आनंद आहे, भविष्यात पूर्णवेळ कर्मचारी मान्यतेसाठी लालबावटा युनियन कायम लढत राहील, असा आशवाद कॉ. तानाजी ठोंबरे यांनी व्यक्त केला. आयटक संलग्न अंशकालीन आरोग्य स्त्री परिचर संघटनेच्या जिल्हास्तरीय सोलापुरातील विजयी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. निलेश दातखिळे (पुणे), कॉ. एम.डी.कुलकर्णी, यशवंत फडतरे, लहू आगलावे, राजू करली, उषा कांबळे, श्रीकांत कांबळे, अनिरुध्द नकाते आदी उपस्थित होते. विजयी मेळाव्या निमित्ताने प्रातिनिधीक महिलांचा गौरव करण्यात आला. शासनाने तीन हजाराचे मानधन सहा हजार केले, याचा आपणास आनंद आहे. आपण आनंद साजरा करत आहोत. परंतु एकीकडे समाजात मिंधेपणा निर्माण करुन मतपेटी शाबूत करण्यावर भर दिला जात आहे. तुम्ही खेड्यापाड्यात महिलांच्या, मुलांच्या आरोग्यासाठी अल्प मानधनावर काम करत आहात. गावात दवाखाना आहे, पण डॉक्टर नाहीत, तुम्हीच त्यांची काम करत आहात. परंतु शासन तुम्हाला पूर्ण कर्मचारी मानत नाही. संघटन शक्तीच्या जोरावर आपण हक्क मिळवून घेऊ, असे ठोंबरे म्हणाले. प्रास्ताविक भाषणात प्रविण मस्तूद यांनी संघटनेच्या चळवळीचा आढावा घेतला. मेळाव्यासाठी राजेंद्र करली, अनुराधा बोडरे, राधा खरात, पूजा पारसे, सविता कुलकर्णी, मुमताज शेख, शेखर बिनगुंडी आदींनी परिश्रम घेतले. गेल्या तीस वर्षांपासूनच्या लढ्याचा मागोवा घेताना काही संघटना श्रेय लाटण्यासाठी पुढे येत आहेत. परंतु लालबावटा व इतरांच्या कृती समितीच्या लढ्यामुळेच संघटनेच्या पदरात सहा हजार रुपयांचे मानधन मिळाले आहे. शासनाने हे परिपत्रक काढण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, सचिव मंगेश शिंदे व हजारे ताई यांनी कसे प्रयत्न केल्याचे निलेश दातखिळे यांनी सांगितले.
श्री रामनवमीच्या उद्देशाने जय श्रीरामचा नारा देत चेहऱ्याविना एकवटलेल्या तरुणाईने यंदाही आपल्या कार्यात सातत्य राखून कुर्डुवाडी व परिसरातील पंचक्रोशीतील लोकांसाठी सप्ताहभर संगीतमय रामकथेची आयोजन करुन अवघा रंग एक झाला म्हणत संपूर्ण पंचक्रोशी राममय करण्यात या तरुणाईचा मोठा वाटा आहे. श्रीरामनवमीनिमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात टेंभुर्णी रोड गावदेवी मंदिरापासून ते रेल्वे कॉलनी श्रीराम मंदिरापर्यंत शहरातील सर्व प्रमुख मार्गावरून श्रीरामाचा जयघोष करत दुचाकी रॅली काढण्यात आली. माढा तालुका सकल हिंदू समाज या नावाने एकवटलेल्या तरुणाईला आजही कोणता चेहरा नाही याचे नेतृत्व संपूर्ण सकल हिंदू समाज करत आहे. विशेष म्हणजे शहरातील नागरिकांनाही ही संकल्पना आवडल्याने नागरिकही मोठ्या प्रमाणात या तरुणाईच्या कार्याला हातभार लावून या धार्मिक उत्सवाला यथाशक्ति असे योगदान देत आहेत. मागील तीनवर्षापूर्वी जय श्रीराम चा नारा देत ही तरुणाई एकवटली होती. आजही याग्रुपचे सातत्य कायम आहे. विशेष म्हणजे यातील तरुण विविध पक्ष, संघटना याचे पदाधिकारी तसेच विचारधारेचे आहेत. मात्र या श्रीरामनवमी उत्सवात हे सर्व पदाधिकारी आपला पक्ष बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त सकल हिंदू समाजाच्या नावाने एकवटतो. याला कोणत्याही राजकीय पक्षाची अद्याप तरी किनार लागलेली नाही. त्यामुळे सर्व राजकीय पक्षाचे नेते सुद्धा या तरुणाईच्या कार्यावर खुष आहेत. प्रतिनिधी | अक्कलकोट संपूर्ण ब्रम्हांडात ईश्वराने सर्वात बुद्धिवान प्राणी म्हणून मनुष्य प्राण्याची निर्मीती केली आहे. मनुष्य प्राण्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रचंड भौतिक सुख सुविधा निर्माण केलेल्या आहेत. ईश्वराने सर्वांना जशी समान बुद्धी दिलेली आहे. तशी कमी जास्त प्रमाणात सर्वांना द्वेश, मत्सर, संपत्ती, अहंभावही दिले आहे. या अहंभावातून जो अहंकार निर्माण होतो त्यातून शांती व स्थैर्याला बाधा होते, अगदी अश्मयुग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग ते आता कलियुगापर्यंत कालचक्राचा हा एक अविभाज्य असल्याचे भावोद्गार प्रथमेश इंगळे यांनी काढले. आपल्या आध्यात्म व धार्मिक संस्काराच्या शिकवणीमुळे संपूर्ण जगात भारताकडे विश्वशांतीचा संदेश देणारा राष्ट्र म्हणून पाहिले जात आहे. कारण भारत ही संतांची भुमी व देवभूमी म्हणूनही प्रचलीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीलाही अहंकारच कारणीभूत आहे. या अहंकाराला शांती मार्गाने शांत करण्याचे कसब केवळ भारताकडेच आहे हे संपूर्ण जगाला कळून चुकले आहे. संपूर्ण जगाच्या या मानसिकतेला बळ देण्यासाठी भारतातील प्रत्येकाने विश्वशांती व मनःशांतीसाठी प्रभू श्रीरामांची जीवनशैली व विचार सारणी आत्मसात करून अहंकाराचा त्याग करावा, असे भावोद्गार प्रथमेश इंगळे यांनी काढले. सकाळी १० ते १२ या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या आधिपत्त्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने भक्तिभावाने पारंपारीक भजन सोहळा संपन्न झाला. दुपारी १२ वाजता देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे व नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या व उपस्थित भक्तांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या पाळण्यावर गुलालपुष्प वाहण्यात आले. यानंतर सत्संग महिला भजनी मंडळ व समर्थ नगर भजनी मंडळाच्या पाळणा गीताने श्रीराम जन्मोत्सव व पाळणा कार्यक्रम पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचालित स्टेशन रोडवरील श्रीराम मंदिरात व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात आज रामनवमी उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या भक्ती भावात साजरा करण्यात आला. यावेळी प्रथमेश इंगळे बोलत होते. वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील ज्योतिबा मंडपात जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गोंदीचे कीर्तनकार योगीराज महाराज गोंदीकर यांची श्रीराम कथेवर आधारित कीर्तनसेवा पार पडली. या कीर्तन सेवेत योगीराज महाराज गोंदीकर यांना तबल्यावर सोलापूरचे सुप्रसिद्ध तबला वादक नितीन दिवाकर व हार्मोनियमवर पाठक यांनी साथ संगत केली. रामाच्या मूर्तीस सकाळी ६ वाजता देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने नगरसेवक इंगळे यांच्या हस्ते रुद्राभिषेक केले. दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून गर्दी हिंदू देवालय संस्था श्रीराम मंदिराचे हे शतकमहोत्सवी वर्ष असून रामनवमी निमित्त मंदिराला फुलांनी सजविण्यात आले होते.आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. गुढीपाडवा ते रामनवमी असा हा उत्सवाचा कार्यक्रम असतो.या दिवसात मंदिरात कीर्तन, भजन व प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज स. १० वा नारदीय कीर्तन व दुपारी १२ वा ३३ मि. रामजन्मोत्सव व प्रवचन झाले. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. श्रीराम कथेवर आधारित कीर्तनसेवा
चैतन्य व्हनकळस ठरला सुवर्णपदकाचा मानकरी:राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गौरव
बार्शी राहुरी कृषी विद्यापीठात एमएस्सी हॉर्टीकल्चर मध्ये व्हेजिटेबल सायन्स या विषयात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल बार्शीच्या चैतन्य निहालकुमार व्हनकळस याला बीएसएस सुरेश अग्रवाल सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. राज्याचे राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पदवीदान कार्यक्रमात चैतन्य याला सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. चैतन्य याचे पहिली ते १२ वी पर्यंतचे शिक्षण बार्शीतील कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या शैक्षणिक संकुलात झाले आहे. बारामती येथील कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर मधून त्याने बीएस्सी अँग्री पदवी घेतल्यानंतर तेथेच त्याने एमएस्सी हॉर्टीकल्चर - व्हेजिटेबल सायन्स या विषयातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. एमएस्सी प्रथम वर्षात त्याने कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. कॉलेजमध्ये टॉप केल्याने त्याचा गेल्यावर्षी प्रतिभा पवार गोल्ड मेडलने सन्मान झाला होता. त्यानंतर एमएस्सी द्वितीय वर्षातही त्याने उत्कृष्ठ यश मिळवले. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत एमएस्सी (हॉर्टीकल्चर) व्हेजीटेबल सायन्स या विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याला बीएसएस सुरेश अग्रवाल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येते. राहुरी कृषी विद्यापीठात व्हेजीटेबल सायन्स या विषयात चैतन्य याने प्रथम क्रमांक पटकावल्याने तो बीएसएस सुरेश अग्रवाल सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. राहुरी कृषी विद्यापीठात ३९ वा पदवीदान समारंभ नुकताच झाला. या समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत चैतन्यचा सुवर्णपदक देवून गौरव करण्यात आला. खडतर परिस्थितीत चैतन्यचे यश चैतन्यची घरची परिस्थिती बेताची आहे. वडील निहालकुमार रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. चैतन्य हा सुरूवातीपासूनच अभ्यासात हुशार असल्याने आईवडिलांनीही उच्च शिक्षणाचा ध्यास घेत त्याला शिकवले. चैतन्य यानेही आई रोहिणी, आजी कस्तुरबाई, वडील निहालकुमार व भाऊ प्रविण यांच्या कष्टाचे चीज करत दैदिप्यमान यश मिळवले. या यशाबद्दल चैतन्य व त्याच्या कुटुंबियांचे अभिनंदन होत आहे.
बार्शी तालुक्यातील वैरागसह ग्रामीण भागात बुधवारी संध्याकाळी गारपिटीसह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे द्राक्ष व आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काढणीस आलेल्या आंबा ज्वारी, गहू पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आठवडाभर कडाक्याच्या उन्हानंतर बुधवारी वैराग, काळेगाव, घाणेगाव, मानेगाव, पिंपरी साकत, जळगाव, रुई, रातंजन, हत्तीज,इर्ले, मळेगाव, लाडोळे, सर्जापूर, रातंजन परिसरात अवकाळी पावसाने झोडपून काढले. तर काही भागात गारांचा पाऊस पडल्याने शेतातील उभी पिकं वादळी वारे व गारपिठीने भुईसुपाट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हत्तीज येथे दि २५ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे... हत्तीज येथील गट क्रमांक ११३/२/ब मधील शेतकरी संजय पांडुरंग कुठे यांच्या द्राक्षबागेचे फाउंडेशन (दोन लाईनमधील सुमारे २०० झाडे) जोरदार वाऱ्यामुळे जमिनीतून उचकटून पडले. या घटनेत सुमारे ०.६० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबाग बाधित झाली असून शेतकऱ्याचे सुमारे २ ते ३ लाखाचे मोठे आर्थिक नुकसान झालेले शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर दुसरीकडे मात्र इर्ले गावातील संतोष अरुण पाटील यांच्या देखील पाऊसाने व वादळी वाऱ्याने पाच एकर केळी बागेचे व ८ ते १० लाख रुपयाचे मोठे नुकसान झाले आहे. संतोष पाटील हे मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाकडून प्राथमिक माहिती घेण्यात आली . प्रतिनिधी | पापरी पापरी परिसरात बुधवारी रात्री झालेल्या वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पावसाचा द्राक्ष, केळी, डाळींब आदी बागांना तसेच कांदा, गहू आदी पिकांना जोरदार फटका बसला असल्याने कोट्यवधी रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घराचे लोखंडी अँगल साठ्यासह पत्रे उंच उडून ५० फुटावर जाऊन पडले असल्याने संसार उघड्यावर आले आहेत. बुधवारी मध्यरात्री झालेल्या गारपिटीने ११० शेतकऱ्यांचे बागायत नुकसानी क्षेत्र ८५ हेक्टर तर ९० शेतकऱ्यांचे फळबागांचे ६५ हेक्टरचे नजर अंदाज समजून यात माहिती उपलब्धतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे, असेसहायक कृषी अधिकारी आप्पासाहेब येवले यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत रात्री पडलेल्या गारांचे खच बागेत दिसून येत होते. अनेक ठिकाणी वीजवाहक तारा आणि लोखंडी विद्युत पोलही वाकून जमिनीकडे कमानी सारखे झुकलेले दिसून येत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी विहिरीवर, कूपनलिकेवर बसवलेले सौर पंपाच्या प्लेट तुटून, उडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे. कृषी व महसूल विभागाकडून नजर अंदाज स्वरूपात नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे. अवकाळी पाऊस,वादळी वाऱ्याने व गारपिटीच्या माऱ्याने एका क्षणात होत्याचे नव्हते झाले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकरी किमान १० वर्षे तरी आर्थिक दृष्ट्या मागे गेला असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. काढणीस आलेल्या द्राक्ष बागेत द्राक्षमण्यांचा सडा पडला आहे तर केळी पीक भुईसपाट झाले असून केळी घडांवर गारांचा मारा लागून त्यावर व्रण उमटून ती काळी पडली आहेत. कांदा, गहू,मका आदी पिकेही जमीनदोस्त झाली तर डाळिंबाच्या बागेतील झाडे वादळी वाऱ्याने गोलाकार फिरून कोलमडून उन्मळून गेली असून आंबा, चिकू या झाडांखाली सदर फळांचे अंथरून झाले असून शेतकरी हतबल होऊन खचून गेला आहे. गुलाब शेतीतील रोपांचे कलम निघून फक्त काड्याच शिल्लक राहिल्या आहेत. झालेल्या सदर नुकसानीची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवर सांगितली असून प्रशासनाला नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. ^आम्हास पंचनाम्यांचे आदेश नाहीत. परंतु संबधित तलाठी यांस नुकसानीची माहिती संकलित करण्यास सांगितले आहे. त्यांच्याकडून माहिती प्राप्त होताच वरिष्ठांना कळवून त्यांचे आदेश प्राप्त होताच पंचनामे करण्यात येतील. सचिन मुळीक, तहसीलदार मोहोळ ^तीन एकर डाळींब बागेचा बहार धरला होता. त्याची फळे चेंडू, लिंबू आकाराची झाली आहेत. ४ लाख रुपयांचा आतापर्यंत खर्च केला होता. मात्र गारपीठ आणि वादळी वाऱ्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी मध्यरात्री गारा पडलेल्या गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत बागेत तशाच दिसून येत होत्या. गणेश भोसले, डाळींब उत्पादक, पापरी ^मध्यरात्री गारा पडलेल्या गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत बागेत तशाच दिसून येत होत्या. पापरी परिसरातील झालेल्या सर्व नुकसानीची परिस्थिती व माहिती कृषी सहायक, पर्यवेक्षक यांस घेण्यास सांगितली आहे. नजर अंदाज माहिती वरिष्ठांना कळवण्यात येईल. हर्षद निगडे, तालुका कृषी अधिकारी, मोहोळ प्रतिनिधी | पानगाव बार्शी तालुक्यातील पानगाव व परिसरातील कळंबवाडी (पा) बावी ( आ) घानेगाव, साकत पिंपळगाव( पा), महागाव आसपासच्या गावात बुधवारी सायंकाळी अचानक वादळीवाऱ्यासह तसेच विजेच्या कडकडाटासह गारपीटीसह पावसाने जोरदार हजेरी लावली. ऐन उन्हाळ्यात पडलेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या समोर नवे संकट उभे राहिले आहे. वातावरणात बदल होऊन जोरदार पावसासह गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली असून रब्बी पिकांना फटका बसला आहे. दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढत आकाशात ढग दाटून आले आणि काही वेळातच गारांसह मुसळधार पाऊस सुरू झाला. या गारपिटीमुळे खरीप हंगामातील ज्वारी, कांदा, हरभरा, गहू , मका, द्राक्ष तसेच आंबा पिकांना तसेच इतर पिकांना फटका बसला असून,नुकसान झाल्याचे दिसत आहे. सध्या ज्वारी काढण्याची लगबग सुरू असताना अचानक आलेल्या पावसामुळे काढून ठेवलेली ज्वारी तसेच उभी उभी असलेली ज्वारी भिजल्याने तिच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन ज्वारी काळी पडण्याची शक्यता निर्माण आहे. एकीकडे बाजारपेठेत शेतीमालाला भाव कमी असताना या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. प्रतिनिधी | वैराग बार्शी तालुक्यातील इर्लेवाडी शिवारातील दत्तात्रय उर्फ नाना गायकवाड यांच्या दोन बेदाणा शेड वरील संपूर्ण झाकलेले ताडपत्री व लोखंडी शेडचे वादळ वाऱ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या दोन शेडमध्ये सुमारे ४० टन द्राक्षे ही बेदाणा तयार करण्यासाठी टाकण्यात आली होती . या वादळी वाऱ्यामुळे तुकाराम दत्तात्रय गायकवाड यांचे सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे . याबाबत माहिती अशी की, बार्शी तालुक्यातील इर्लेवाडी शिवारात दत्तात्रय गायकवाड यांची द्राक्ष बाग असून ते प्रत्येक वर्षी या द्राक्षाचा बेदाणा करतात. याही वर्षी त्यांनी स्वतःच्या दोन शेडवर सुमारे ४० टन द्राक्ष वाळवण्यासाठी टाकली होती. गुरुवार दि. २५ रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तासाने वादळी वारे आले. या वादळी वाऱ्यात बेदाणा शेडचे वेल्डिंग तुटून शेडवरील वरच्या दोन शिड्या उडून गेले. त्यामुळे शेड वर वळवण्यासाठी टाकळवली द्राक्षे पूर्ण भिजून गेले. त्यामुळे दत्तात्रय गायकवाड यांचे सुमारे तीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, तरी याची दखल घेवून पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. अवकाळी पावसाने संसार उपयोगी साहित्य भिजले ^बुधवारी मध्यरात्री झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीच्या अवकाळी पावसाने घरावरील संपूर्ण लोखंडी अँगल साठ्यासह पत्रे शेतात ५० फुल लांब जाऊन उडून पडले आहेत. सर्व संसार उघड्यावर आला असून संसार उपयोगी इलेक्ट्रिक साहित्य, कपडे तसेच मुलांची दप्तरेही भिजली आहेत. भिंतीलाही तडे गेले आहेत. विलास सावंत, ग्रामस्थ, पापरी वरिष्ठांना कळवण्यात येईल गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान पोटच्या लेकराप्रमाणे द्राक्ष बागांना शेतकऱ्यांनी वर्षभर खर्च करून संभाळले होते. परंतु या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तरी शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. संजय कुठे, द्राक्ष उत्पादक, शेतकरी प्रशासनाने तातडीन नुकसानीचे पंचनामे करावेत ^बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचून खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने तत्काळ पंचनामा करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी. विक्रम देशमुख, शेतकरी, कळंबवाडी आदेश प्राप्त होताच पंचनामे करणार शासनाने पंचनामे करत नुकसान भरपाई द्यावी ^७ एकर द्राक्षबाग उतरणीस आली होती. मात्र वादळी वाऱ्याने व गारपिटीने बागेवरील ६० टक्के द्राक्षघडच गळून पडले असून ५० लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. क्षणात होत्याचे नव्हते झाले कष्टाची तसेच स्वप्नांची सर्व राखरांगोळी झाली आहे. शासनाने पंचनामे करत नुकसान भरपाई द्यावी. बालाजी भोसले, द्राक्ष उत्पादक, पापरी
किल्लारीत रामनवमीला यात्रेचे स्वरूप:10 हजार भाविकांचे रांगा लावून दर्शन
किल्लारी येथे रामनवमी उत्सवानिमित्त यंदा मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडत असून, सुमारे १० हजार भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती असल्याने संपूर्ण उत्सवाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. राष्ट्रीय संत मोरारीबापू यांच्या प्रेरणेतून भूकंपग्रस्तांचे मनोबल वाढविणे आणि भक्तीची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने किल्लारी येथे सुमारे चार एकर जागेत कोट्यवधी रुपयांचा भव्य राममंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात रामनवमी निमित्त सिताराम ट्रस्ट, लातूर यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारपासून रामायण पारायण व भजन कार्यक्रम सुरू होते. रामनवमीच्या दिवशी दर्शनासाठी विशेषतः महिलांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी १२ वाजता रामजन्म सोहळा, महापूजा व आरती आमदार अभिमन्यू पवार, श्यामभाऊ बियाणी, अॅड. संतोष गिल्डा व श्रीरंग गिल्डा यांच्या हस्ते पार पडली. यानंतर महिलांनी पारंपरिक पद्धतीने पाळणा गाऊन रामजन्मोत्सव साजरा केला.यावेळी सिताराम ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांसाठी महाप्रसाद व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, नीलकंठेश्वर मंदिर ते राममंदिर मार्गावर मिरवणूक काढण्यात आली. यात उमरगा, औसा, निलंगा, लोहारा किल्लारीसह अनेक गावांतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गॅस नाही, लाकडावर महाप्रसादाची तयारी गॅसची सुविधा उपलब्ध नसतानाही पारंपरिक पद्धतीने लाकडावर स्वयंपाक करून १० हजार भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. तसेच किल्लारी पाटी येथे व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने रामजयंती साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
प्रतिनिधी | लातूर उन्हाळ्यातील मार्च महिना संपेपर्यंत टंचाईच्या झळा बसू लागतात. यंदा लातूर जिल्ह्यात पावसाळ्यात पडलेला समाधानकारक पाऊस पडला. परिणामी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील विविध मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प आणि मोठ्या तलावांमध्ये मार्च अखेरपर्यंत मोठा साठा उपलब्ध आहेत. सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी ५२ टक्के पाणी उपलब्ध असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनासाठी पाणीटंचाईची भेडसावणार नाही. लातूर जिल्हा हा कृषी क्षेत्रावर अधिक मदार असलेला जिल्हा आहेत. साधारणत: ६ ते ६.५० लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिके घेतली जातात. यामध्ये बहुतांश जमीन ही कोरडवाहू असल्यामुळे पावसाच्या पाण्यावर आणि विविध साठवण तलाव, लघु सिंचन प्रकल्प, मध्यम प्रकल्पांना मोठे महत्व आहे. लातूर जिल्ह्यात पाटबंधारे िवभागांतर्गत ८ मध्यम प्रकल्प, ११५ लघु पाटबंधारे प्रकल्प तलावासह अनेक लहान मोठे प्रकल्प आहेत. दरम्यान, गतवर्षी मे-२०२५ महिन्याच्या अखरेपासून सूनच अवकाळी आणि अतिवृष्टी सुरू झाली. जुन मधील समाधानकारक, ऑगस्ट मधील मुसळधार तर परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील आठही मध्यम प्रकल्प आणि लघु प्रकल्प तुडूंब भरले होते. दरम्यान, मागील पाच महिन्यांमध्ये पाण्याचा साठा कमी असला तरी अद्यापही बहुतांश प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी उपलब्ध असल्यामुळे उन्हाळ्यातही पाण्याची उपलब्धता असणार आहे.
व्हिडिओ ब्लॉग निर्मितीतून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळेल नवी दिशा- डॉ. आहेर
विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर न थांबता सर्जनशीलता आणि डिजिटल सादरीकरण कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक आहे.या आधुनिक कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, आधुनिक जगात वावरताना आत्मविश्वास निर्माण होतो.असे प्रतिपादन प्राचार्य डॉ रंगनाथ आहेर यांनी केले. पारनेर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाने आयोजित केलेल्या व्हिडिओ ब्लॉग (व्लॉग) स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य आहेर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. प्राचार्य डॉ.आहेर म्हणाले, इंग्रजी विभागाचा व्लॉग निर्मिती व व्लॉग स्पर्धेचा उपक्रम अनोखा आणि कौतुकास्पद आहे. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून ,त्यांच्या सर्जनशीलतेला आणि सादरीकरण कौशल्याला एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे डॉ.आहेर म्हणाले. इंग्रजी विभागप्रमुख प्रा. अशोक मोरे यांनी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तांत्रिक लेखन,जर्मन भाषेचे प्रशिक्षण तसेच ‘लँग्वेज लॅब’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा आढावा प्रा.मोरे यांनी घेतला. व्लॉग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.स्पर्धेचे परीक्षण प्रा. प्रकाश गावित आणि प्रा. निलेश सोबले यांनी केले.प्रा. गावित यांनी विद्यार्थ्यांना व्लॉग निर्मितीतील तांत्रिक बाबी,प्रभावी सादरीकरणाचे कौशल्य आणि दर्जेदार व्हिडिओ निर्मितीबाबत मार्गदर्शन केले. प्रा. राहुल अमोलिक, प्रा.नलिनी गायकवाड, डॉ. हरेश शेळके, प्रा.नितीन निपुंगे,प्रा.शामराव रोकडे, प्रा. दीपक खामकर, प्रा.सयाजी मोहिते,प्रा.सोफिया तांबोळी,प्रा. वैभव रोकडे,प्रा.सौरभ रेपाळे, प्रा.तेजस तुपे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.आनंद पाटेकर यांनी, तर आभार डॉ.प्रांजली भराटे यांनी मानले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये सामाजिक,शैक्षणिक आणि सर्जनशील विषयांची प्रभावी मांडणी केली.या माध्यमातून विद्यार्थ्यांची कल्पकता,अभिव्यक्ती आणि विचारांची परिपक्वता प्रकर्षाने समोर आली असल्याचे परीक्षकांनी सांगितले.
हजारो भक्तांच्या उपस्थितीत नेवाशात श्रीराम नवमीनिमित्त भव्य शोभायात्रा
श्रीराम नवमीनिमित्त नेवासे तालुका श्रीरामराज्य उत्सव समितीच्या वतीने बुधवारी सायंकाळी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. हजारो रामभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने व सियावर रामचंद्र की जय, जय श्रीराम, जय जय श्रीराम, या जयघोषांनी अवघी नेवासे नगरी दुमदुमून गेली होती. मळगंगा देवी मंदिर येथून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. फुलांनी सजवलेल्या रथावर प्रभू श्रीरामांच्या आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गुरुवर्य भास्करगिरी महाराज, देवीदास महाराज म्हस्के, उद्धव महाराज मंडलिक व ऋषिनाथ महाराज यांच्या हस्ते पूजन व महाआरती करण्यात आली. त्यानंतर सामूहिक हनुमान चालीसा पठणाने वातावरण भक्तिमय झाले. शोभायात्रेत सहभागी झालेल्या रामभक्तांनी राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की अशा घोषणांनी वातावरण दणाणून सोडले. महिला भगिनींसह युवक-युवतींचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. भगव्या झेंड्यांनी सजलेले रस्ते, स्वागत कमानी व ढोल-ताशांच्या निनादात अवघे शहर राममय झाले होते. राजे शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विविध चौकांत शिवकालीन मर्दानी खेळांची नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. मिरवणूक मार्गावरील मळगंगादेवी मंदिर, एस.टी. स्टँड परिसर, श्री खोलेश्वर गणपती चौक, नगरपंचायत चौक, डॉ. हेडगेवार चौक, मारुती चौक ते श्रीराम मंदिर या मार्गावर भव्य कमानी, झालर कनाती व भगवे ध्वज लावून संपूर्ण परिसर उत्सवमय करण्यात आला होता. मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडावी यासाठी पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मिरवणूक मार्गावर रांगोळ्या काढून वातावरण मंगलमय करण्यात आले होते. कपिल चिंतामणी यांनी रस्त्यावर रांगोळ्या साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
संगमनेरमध्ये श्रीराम नवमी साजरी:शहर व तालुक्यातील श्रीराम मंदिरांमध्ये कार्यक्रमांचे केले आयोजन
संगमनेर शहर आणि तालुक्यातील विविध राममंदिरात प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार अमोल खताळ पत्नी नीलम खताळ, उद्योजक राजेश मालपाणी, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, योगराज परदेशी आदी राम भक्तांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची महाआरती करण्यात आली. शहरातील चंद्रशेखर चौकातील राममंदिरामध्ये श्रीराम जयंती उत्सव समितीच्या वतीने मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. दुपारी महिला रामभक्तांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने रामजन्माचा पाळणा गात, प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला. या वेळी राम भक्तांनी जय श्रीराम च्या घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला. राम जन्मोत्सव समितीच्या वतीने आमदार खताळ, पत्नी नीलम खताळ, उद्योजक राजेश मालपाणी, पोलिस निरीक्षक समीर बारवकर, ऋषिकेश मोंढे, राम मंदिर ट्रस्ट विश्वस्त उपासनी बंधू, विशाल जाखडी, श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई, उपाध्यक्ष कमलाकर भालेकर, विनय गुणे, गिरीश देशपांडे, श्रीराम गणपुले, वरद बागुल, मुन्ना जोशी, योगेश मंगलकर, राम वामन, विनायक तांबे, विलास परदेशी, योगराज परदेशी, अक्षय थोरात आणि ऋषिकेश मुळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहरातील प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने रामभक्तांनी गर्दी केली होती. रामजन्मोत्सव समितीतर्फे दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तांसाठी मठ्ठ्याची व्यवस्था केली होती. संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौक, पंजाबी कॉलनी तसेच नवीन नगर रोडवरील अभिनव नगर येथील राममंदिरांमध्ये उत्सवाची जय्यत तयारी सुरू होती. फुलांनी मंदिरांची सजावट करण्यात आली होती तसेच सर्व राम मंदिरे रोषणाईने उजळून निघाली. संगमनेर तालुक्यात सर्व महापुरुषांचे जन्मोत्सव सोहळे उत्साहात साजरे होतात, रामजन्मोत्सव सोहळा सर्व श्रीराम मंदिरात साजरा झाला. याचा आनंद आहे, असे आ. खताळ म्हणाले.
श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्यावतीने नवीपेठ येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव अत्यंत भक्तिभाव, शिस्तबद्ध नियोजन आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी आणि “श्रीराम जय राम जयजय राम” या अखंड मंत्रजपाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. पहाटे ६ वाजता जलाभिषेक, दुग्धाभिषेकाने कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली. आकर्षक फुलांची सजावट, रंगीबेरंगी विद्यूत रोषणाई आणि अयोध्येच्या धर्तीवर उभारलेली सजावट यामुळे मंदिर परिसर दिव्य आणि प्रसन्न भासत होता. सकाळी मंगल आरतीनंतर भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले. सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत सामूहिक नामजप व हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो भाविक एकसुरात मंत्रोच्चार करताना दिसले. मंत्रजपाच्या गजरात वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते. दुपारी बरोबर १२ वाजता प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा पार पडताच मंदिर परिसरात टाळ्या, घंटानाद आणि “जय श्रीराम”च्या जयघोषाने जल्लोष उसळला. भाविकांना सुरळीत व जलद दर्शन मिळावे यासाठी ट्रस्टच्यावतीने दर्शनबारी, स्वतंत्र प्रवेश-निर्गमन व्यवस्था, मंडप, पिण्याच्या पाण्याची सोय आदी सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांना मार्गदर्शन करत संपूर्ण व्यवस्थापन यशस्वी केले. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. गेल्या १९ वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत होळी पौर्णिमेपासून ३१ दिवस शहरभर सामूहिक हनुमान चालीसा पठण, भजन संध्या आणि धर्मप्रसाराचे विविध कार्यक्रम घेतले जातात. यंदाही या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून शहरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक घराघरांत श्रीरामभक्तीचा संदेश पोहोचावा या उद्देशाने कार्यक्रमादरम्यान मोफत हनुमान चालीसा पुस्तिकांचे वितरण करण्यात आले. तसेच दररोज श्रीरामचरितमानसातील चौपाई वाचन, आरती व प्रसाद वितरणाने कार्यक्रमाचा समारोप केला जात आहे. श्रीराम जन्मोत्सवाच्या दिवशी मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. दिवसभरात हजारो भाविकांनी श्रीरामांचे दर्शन घेत आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतला. गुरुवारी (दि.२ एप्रिल) पहाटे ६ वाजता श्री हनुमान जन्मोत्सवही याच ठिकाणी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्रितम मुथ्था व उपाध्यक्ष निखिल शेटीया यांनी दिली.
आणखी पाच दिवस धुळीतून प्रवास:वारूळाचा मारुती'' मार्गाने जाताना धुळीमुळे वाहनधारक त्रस्त
कल्याण रोडवरील जोडणाऱ्या सीना नदीवरील पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने १७ ते ३१ मार्चदरम्यान हा रस्ता बंद ठेवला आहे. ७.५ किमीचा लांबचा वळसा घालून ये-जा करण्याऐवजी दुचाकी, छोटे वाहनचालक पर्यायी मार्ग म्हणून वारूळाचा मारूती रस्त्याने जात आहेत. परंतु अंतर्गत रस्त्याने जाताना प्रचंड धुळ उडत असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत. वारूळाचा मारूती रस्त्याने कल्याण रोडला जाण्यासाठी अंतर्गत रस्ता निमूळता आहे. मोठी वाहनेही याच मार्गाने जात असल्याने येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
प्रतिनिधी | येवला शहरात रामनवमीनिमित्त बुधवारी (दि.२५) सायंकाळी श्री साईबाबांचा पालखी सोहळा उत्साहात पार पडला. बदापूर रस्त्यावरील साईबाबा मंदिरापासून भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत साकारण्यात आलेले सजीव देखावे मुख्य आकर्षण ठरले. ‘ ॐ साई राम’च्या जयघोषात शहर दुमदुमून गेले होते. या देखाव्यात साईबाबा, त्यांच्या निस्सीम भक्त बाईजाबाई आणि म्हाळसापती यांची वेशभूषा केलेले कलाकार सहभागी झाले होते. हुबेहूब साकारलेल्या या सजीव देखाव्याने शहरवासीयांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. पालखी शहरातून मार्गस्थ होत असताना ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर घरांसमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच फुलांची उधळण करून पालखीचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी शहर आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मिरवणुकीदरम्यान डीजेच्या तालावर साईंच्या गीतांवर तरुणाईने ठेका धरला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. भक्ती आणि शिस्तीचा अनोखा संगम या मिरवणुकीत पाहायला मिळाला. प्रतिनिधी | लासलगाव शहरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भक्तीपूर्ण भजन आणि धार्मिक वातावरणामुळे संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते. या शोभायात्रेत वेळापूर येथील धर्मवीर मर्दानी खेळ व शिवकालीन प्रशिक्षण केंद्र वेळापूर यांच्या पथकाने सहभाग नोंदवला. लासलगाव परिसरातील ५००हून अधिक वारकरी भजनी मंडळे या मिरवणुकीत सहभागी झाली होते. प्रभू रामलल्ला यांचा अयोध्या येथील जिवंत देखावा स्थानिक कलाकार दत्ता भांबरे यांनी साकारला होता. लासलगाव बसस्थानक परिसरातील बाबा अमरनाथ मंदिरात सायंकाळी ४ ते ५ या वेळेत श्री हनुमान चालीसा पाठाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी ५ वाजता स्टेशनरोड, बस स्टँड परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठमार्गे श्रीराम मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. अनेक तरुणांनी भगवी टोपी परिधान करून ‘राम लल्ला’च्या जयघोषात सहभाग घेतला. सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रीराम गीतांचा ‘स्वरस्पंदन ऑर्केस्ट्रा’ कार्यक्रम झाला. रात्री ८ वाजता झेंडा चौक येथे महाप्रसादाचे आयोजन केले होते. लासलगाव येथील राम मंदिर ट्रस्टच्या वतीने श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. परिसरातील भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या हस्ते महाआरती पार पडली. उत्सव यशस्वीपणे पार पडावा यासाठी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव होळकर, डॉ. कैलास पाटील, डॉ. युवराज पाटील, सुरेश वडनेरे, विष्णू निकम यांच्यासह इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
हिंदू समाजाने संघटित होणे आगामी काळासाठी गरजेचे:घोटीतील कार्यक्रमात अभिनेते पोंक्षे यांचे प्रतिपादन
आगामी काळातील विविध सामाजिक आणि राष्ट्रीय आव्हानांचा विचार करता हिंदू समाजाने संघटित होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त घोटी येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. हिंदू संमेलनानिमित्त संपूर्ण शहर भगव्या ध्वजांनी सजले होते. प्रमुख चौकांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तर विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. आपल्या ओघवत्या शैलीत शरद पोंक्षे यांनी भारताच्या इतिहासावर प्रकाश टाकला. यावेळी संघाचे धर्मजागरण प्रमुख राजू पुलया यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमागील उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि प्रवासातील संघर्ष यावर माहिती दिली. कार्यक्रमात गीता कुलकर्णी यांनी कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. सूत्रसंचालन सुरेश काजळे यांनी केले तर आभार हेमंत सुराणा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बबन जाधव, विक्रम मुनोत, भाऊ बोर, श्रीकांत काळे, मधुकर जाधव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी शहरातील हिंदू बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे आमदार संतोष दानवे यांच्या सुमारे साडेसत्तावीस लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. गावातील महत्त्वाच्या भागांमध्ये या कामाला वेग आला आहे. ग्रामस्थांच्या दैनंदिन वापरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या या रस्त्याच्या कामामुळे गावातील वाहतूक व्यवस्था अधिक सुकर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या कामाअंतर्गत जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः पावसाळ्यात चिखल व खड्ड्यांमुळे होणाऱ्या अडचणी आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. शाळेच्या परिसरातील रस्ता सुस्थितीत झाल्यामुळे पालकांमध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील रस्त्याचे काम सुरू आहे. या भागात काम जलद गतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा रस्ता गावाच्या दृष्टीने ऐतिहासिक व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असल्याने या कामाकडे ग्रामस्थांचे विशेष लक्ष लागले आहे. कामाची गुणवत्ता राखत ते वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. दरम्यान, गावातील रेणुकामाता मिरवणूक अगदी जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक बनले आहे. मिरवणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने अपूर्ण कामामुळे अडथळे निर्माण होऊ नयेत. यासाठी प्रशासन व संबंधित यंत्रणा सतर्क झाली आहे. याच अनुषंगाने भाजप नेते राजेंद्र देशमुख व ग्रामपंचायतीने कामाची पाहणी केली. संबंधित गुत्तेदाराला आवश्यक सूचना दिल्या. त्यांनी रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले. कामामध्ये कोणतीही तडजोड न करता दर्जेदार काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. काम जलद पूर्ण झाले पाहिजे. मात्र गुणवत्ता ही सर्वोच्च प्राधान्याने राखली गेली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.
उस्मानपुरा येथील राम मंदिरात तिरुपतीचे डेकोरेशन करण्यात आले. समर्थनगरातील श्रीसमर्थ राम मंदिरात दीड क्विंटल द्राक्षांची आरास करण्यात आली. धनश्री पूर्णपात्रे, अश्विनी पूर्णपात्रे, दीप्ती पाटणी, तृप्ती पाठक यांनी तीन दिवसांत घोटीव कागद, स्टोन, लेसच्या वापरातून ११ इंचांचा टोप तयार केला. एमडीएफ शीटवर काचेचे तुकडे लावून पडदा तयार केला. रामनवमीच्या निमित्ताने मोहन पूर्णपात्रे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. गेल्या वर्षी १२० किलोची बुंदी केली होती. यंदा २०० किलो बुंदीचे वाटप करण्यात आले. या वेळी काकडी, टरबूज, खरबूज, तसेच ३० किलो भाजलेली हरभऱ्याची डाळ वाटप करण्यात आली. दिवसभरात १० हजार भाविकांनी दर्शन केले. अजिंक्य पूर्णपात्रे यांची उपस्थिती होती.श्रीराम यांच्या सुंदर मूर्तीसोबत भाविक मोबाइलमध्ये फोटो काढत होते. उस्मानपुरा येथील राम मंदिरात तिरुपतीचे सुंदर असे डेकोरेशन करण्यात आले. विशेष म्हणजे श्रीराम यांचा टोप महिलांनी हातांनी तयार केला आहे. रंगीत सजावट सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. रामनवमी उत्सव समितीतर्फे राजाबाजार संस्थान गणपतीपासून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी लालबागच्या ब्रास बँडच्या ३५ जणांनी ८ ड्रम, ८ बीट्स, ४ हाफ ढोल, ३ ताशे, २ रोटो, एक की-बोर्ड, ७ भोंगे लावले होते. पथकाने श्रीराम जानकी बैठे हैं.., राम जी की निकली सवारी.., अंजनीच्या सुता.. अशा विविध प्रकारची गाणी सादर केली. कोळीवाड्याच्या ब्रास बँडच्या पथकाने विविध गीते सादर केली. यंदा समितीने देखावा सादर केला. यात अंबरनाथ, मुंबईहून हनुमान रथ ओढताना असा देखावा होता. सारथी म्हणून लक्ष्मण होते. मागे प्रभू श्रीराम सीतेसोबत आशीर्वाद देताना दिसत होते. हा देखावा लक्ष वेधून घेत होता. १० हजार राजगिरा लाडूंचे वाटप केले. मिरवणूक शहागंज, सिटी चौक मार्गे कुंभारवाडा अशी तीन किलोमीटरपर्यंत काढण्यात आली. या वेळी नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल उपस्थित होते.
शहरातील पुरातन राममंदिर म्हणून किराडपुरा राममंदिर प्रसिद्ध आहे. या राममंदिरातील आरतीचा विशेष मान आहे. मंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये तसेच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते आरती झाली. ट्रस्टचे अध्यक्ष मानसिंग पवार, सहसचिव दयाराम बसैय्ये यांनी मागील महिनाभरापासून संपूर्ण उत्सवाचे नियोजन केले होते. रक्तदान शिबिर, संत साहित्याचे स्टॉल्सही येथे लावण्यात आले होते. पहाटे अभिषेक झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. १९ तास मंदिरात भाविकांची गर्दी होती. मंदिराचे संस्थापक सरचिटणीस लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल यांच्या स्मरणार्थ दुपारी सुंदरकांड कथा झाली . पं. दिनेश शर्मा यांनी कथावाचन केले. तुलसीदास रचित रामचरितमानसमधील ५ वा अध्याय सुंदरकांड आहे. त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांना संगीतमय पद्धतीने सादर केले. १. हनुमंतांचे लंकेकडे प्रस्थान-सीतामाईंचा शोध घेण्यासाठी हनुमान अडथळ्यांवर मात करत लंकेत जातात. २. सीता-हनुमान भेट- हनुमान सीतेला रामाचा संदेश देतात आणि त्यांचे सांत्वन करतात. ३. लंका दहन- अशोकवनाची नासधूस केल्यावर बंदी बनलेले हनुमान विशाल रूपाने पूर्ण लंका जाळून राख करतात. ४. रावण-बिभीषण संवाद आणि राम शरण-सीतामाईला सन्मानाने परत पाठवा, असे बिभीषण रावणाला समजावतोस, पण रावणाने साफ इन्कार केल्यावर बिभीषण रामाला शरण येतात. ५. समुद्र ओलांडण्याची तयारी- समुद्र मंथनाची तयारी होते.
सुरतमध्ये राहून नशेच्या गोळ्या:औषधी पाठवणाऱ्याला पकडले, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई
शहरातील ड्रग्ज सिंडिकेटला नशेच्या गोळ्या आणि औषधींचा पुरवठा करण्यासाठी गुजरातमध्ये बसून जाळे विणणाऱ्या एजंटला अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने अटक केली आहे. तो केवळ या काळ्या व्यापारासाठीच २०२१ पासून सुरतमध्ये वास्तव्यास असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्यासह सुरतमधील एका मेडिकल चालकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अजमत अहेमद बेग (रा. शीतल चार रस्ता, सुभाषनगर, सुरत), रमेश गोमाराम चौधरी (रा. गौरवपंथ रोड, पालनपूर गाव, सुरत) असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (२१ मार्च) एएनटीएफच्या पथकाने सापळा रचला होता. ट्रॅव्हल्सने सुरत येथून माल घेऊन आलेला सय्यद अझर सय्यद अकबर (२६, रा. चांदमारी, छावणी) पोलिसांची चाहूल लागताच २ हजार गोळ्या, ११४ सिरप बाटल्या टाकून पळून गेला होता. अखेर सोमवारी (२३ मार्च) छावणी परिसरातून त्याला अटक करण्यात आली. ट्रॅव्हल्सने सुरतहून नशेचा साठा आणणारा ड्रग्ज माफिया अंधा फिरोजचा भाऊ सय्यद अझर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या, तसेच घाटी रुग्णालयासमोर सापळा लावून त्याचा नातेवाईक तौफिक रशीद अली यालाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आरोपी अजमत व रमेशची माहिती मिळाली. पथकाने दोघांना गुजरातमधून अटक केली. ही कारवाई निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक दीपाली पाटील व त्यांच्या पथकाने केली. ४,४०० नायट्राझेपम गोळ्या १३२ कोडिन सिरपच्या बाटल्या १९.५३ : लाख रुपये जप्त मालाची किंमत अजमत बेग हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचाच असून, त्याचे आजोळ छावणीतील चांदमारी भागात आहे. स्थानिक ओळखींचा फायदा घेत त्याने शहरातील नशेखोरांना माल पुरवण्याचे कंत्राटच घेतले होते. तो सुरतमधील केअर फार्मसीचा चालक रमेश चौधरी याला जादा पैशांचे आमिष दाखवून नशेच्या गोळ्या आणि सिरपची खरेदी करायचा. विशेष म्हणजे, हे मेडिकल चालक औषध वितरकांकडून (डिस्ट्रिब्युटर) या नशेच्या गोळ्या कोणत्याही बिलाशिवाय घेत होते. रेकॉर्डवर नोंद नसल्यामुळे कोणत्याही विभागाच्या ही बाब लक्षात येत नव्हती. सिल्क मिल भागातील कुख्यात ड्रग्ज माफिया अखिल मालक याला गुन्हे शाखेने ३ महिन्यांपूर्वी बेड्या ठोकल्या होत्या. तत्पूर्वी त्याचा पार्टनर अंधा फिरोजला पकडले होते. अखिल गुजरातच्या आयशाकडून माल मागवून शहरात पेडलर्सला द्यायचा. मात्र, सखोल तपास न झाल्याने त्याच साखळीद्वारे माल आणून पुन्हा नशेचा बाजार केला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
ढोरकीन पंपिंग सुरू:पाणीपुरवठा योजनेची वेग चाचणी यशस्वी, किरकोळ गळतीमुळे गती मंदावली
शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत गुरुवारी २६ मार्च रोजी एक महत्त्वाचा तांत्रिक टप्पा पार पडला. ढोरकीन येथे उपसा पंप सुरू करताच पाणी अवघ्या २७ मिनिटांत १२,६६० मीटरवरील स्कोअर व्हॉल्व्हपर्यंत पोहोचले. मात्र, ही वेग चाचणी यशस्वी ठरूनही संध्याकाळी विविध ठिकाणी गळती आढळली. अखेर पंपिंग थांबवावे लागले. दुपारी १:१५ वाजता ढोरकीन पंप हाऊसमध्ये मोटर सुरू होताच पाइपलाइनमधून पाणी वेगाने पुढे सरकत होते. काही मिनिटांतच तांत्रिक पथकाच्या संदेशांमधून पाणी पुढे आले’ अशी माहिती मिळू लागली. मात्र, संध्याकाळी अचानक गळतीच्या बातम्यांनी संपूर्ण यंत्रणा पुन्हा सावध झाली. या चाचणीत प्रशासन आणि कंत्राटदार कंपनी जी.व्ही.पी.आर. इंजिनिअर्स लिमिटेड यांचा समन्वय दिसून आला. पाण्याचा वेग आणि दाब नियंत्रित ठेवत पाइपलाइनमधील हवा बाहेर काढण्याची प्रक्रिया यशस्वी झाली. मात्र, काही जॉइंट्स आणि व्हॉल्व्ह अद्याप पूर्णपणे स्थिर नसल्याचे स्पष्ट झाले. ही चाचणी प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यातील महत्त्वाची पायरी मानली जाते. पाइपलाइनमधील हवा काढणे आणि दाब सहनशक्ती तपासणे हे मुख्य उद्दिष्ट होते. गळती दिसणे अपेक्षित असले तरी त्याचे प्रमाण प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण करते. पुढे काय ? कागदावर : ४,००० घनमीटर प्रति तास वेगाने पाणीपुरवठा शक्य प्रत्यक्षात : गळतीमुळे दाब टिकवण्यात अडचणी, सर्व गळतीची तातडीने दुरुस्ती. पुन्हा चाचणी : नियमित पाणीपुरवठ्यापूर्वी अंतिम तपासणी कुठे आढळल्या गळती? {धनगाव : स्कोअर व्हॉल्व्ह, मोटा देवी - डिसमेंटलिंग जॉइंट मोहटादेवी मंदिर : एअर व्हॉल्व्ह पॅकिंग साखर कारखाना परिसर : बटरफ्लाय व्हॉल्व्हचे नट- बोल्ट सैल, ढोरकीन (१३,८८० मीटर) मुख्य गळती
जिल्ह्यात मुबलक प्रमाणात इंधन पुरवठा असलातरी, आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्येधास्ती वाढली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावरवाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्रशहरासह जिल्हाभरात आहे. एका पेट्रोलपंपावरदैनंदिन सरासरी मागणीच्या दुप्पट, इंधनाची गरजभासल्यामुळे काही पंपावर इंधन शिल्लक नव्हते.पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशनच्याम्हणण्यानुसार जिल्ह्यातील अनेक पंपांवर पेट्रोलनव्हते. तर प्रशासनाच्या मते, जिल्ह्यात इंधन साठापुरेसा आहे, अफवांमुळे पंपांवर रांगा लागत आहेत. नागरिकांकडूनच इंधनाची साठेबाजी सुरूझाल्यामुळे पंपांवरील पेट्रोल लवकर संपतअसल्याचे दिसते. यामुळे गुरुवारी पंपचालकांकडून वाहनातच इंधन दिले जात होते. बाटलीत अथवा ड्रममध्ये पेट्रोल व डिझेल देण्यास पंपावर नकार दिला जात आहे. अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर काही पंप गुरुवारीदुपारी बंद होते. तसेच शहरातीलही काही खासगीपंप बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे ज्याठिकाणी इंधन उपलब्ध आहे, तेथे लांबच लांब रांगा पहायला आहेत. ग्रामीण भागात मोठ्या वाहनांबरोबरच, ड्रम अथवा बाटल्यांमध्ये इंधनाची मागणी होते. चार दिवसांपूर्वी तसे इंधन दिले जातहोते. परंतू, वाढती गर्दी पाहता, सुटे इंधन दिले जात नाही. त्यामुळे अफवांना पुन्हा बळ मिळत आहे. दरम्यान, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठाअसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारीहेमा बडे यांनी सांगितले. ८४६ किलोलिटर उपलब्ध प्रशासनाने दिलेल्या अधिकृतआकडेवारीनुसार, जिल्ह्यातील इंधनसाठ्याची वस्तुस्थिती अत्यंतसमाधानकारक आहे. पेट्रोलचीजिल्ह्याची दररोजची गरज ३०८किलोलिटर इतकी असून, सध्या ८४६किलोलिटर इतका मुबलक साठाउपलब्ध आहे. तसेच, डिझेलचीदररोजची गरज ६८९ किलोलिटरअसताना, सध्या १४७१ किलोलिटरइतका साठा उपलब्ध आहे. अफवा पसरवल्यास थेट गुन्हा दाखल करू : जिल्हाधिकारी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व गॅसचा मुबलकसाठा आहे. वितरण सुरळीत आहे. सध्यासोशल मीडियावर इंधन तुटवड्याबाबतखोट्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्यापसरवल्या जात आहेत. नागरिकांनी पेट्रोलपंपांवर विनाकारण गर्दी करू नये. इंधनतुटवड्याबाबत खोटा मेसेज किंवाचुकीची माहिती पसरवणे हा अपराधआहे. जे लोक नागरिकांत घबराट निर्माणकरत आहेत, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखलकरू, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिला आहे. कंपन्यांनी इंधन पुरवठासुरू ठेवलाय कंपन्यांकडून गुरुवारी इंधन पुरवठासुरू करण्यात आला. लोकांनीएकदम गर्दी केल्याने जिल्ह्यात ४००पैकी १७० पंप बंद होते. नगर शहरातबहुतांश पंप बंद होते. यापूर्वीकंपन्यांना नफा मिळाला आहे. आतात्यांनी नफा-तोट्याच्या फारसाविचार नक तरा इंधनाचा पुरवठासुरळीत ठेवावा. - डॉ. स्वाधीन गाडेकर, अध्यक्ष,पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशन,अहिल्यानगर. शेतकऱ्यांची अडचण शेतीसाठी ट्रॅक्टर, हार्वेस्टर, पॉवरटिलर आदी यंत्रांचा वापर केलाजातो. कमी वेगाची ही वाहने, थेटपेट्रोलपंपापर्यंत नेऊन, इंधन भरणेपरवडणारे नाही. त्यामुळे ड्रममध्येचडिझेलची मागणी होते. सुटे इंधनदेण्यावर प्रशासनाने टाच आणलीआहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचणझाली आहे. सध्या अर्धातास रांगेतथांबल्यानंतर इंधन उपलब्ध होते. दिवसभरात दोन टँकर १५००० लिटर, २० हजार लिटर व १२हजार लिटरच्या टँकरद्वारे पंपावरइंधन पुरवठा होतो. दैनंदिनमागणीनुसार इंधनाचा टँकर बुककेला जातो. ग्रामीण भागातील एकापंपावर १५ हजार लिटरचा एक टँकरएक अथवा दोन दिवस पुरतो. तरशहरी भागात काही पंपावर दोनहीटँकर लागतात. सद्यस्थितीत १२हजार लिटरच्या टँकरची मागणीकमी आहे, मागणी वाढल्याने दुप्पटटँकरची गरज निर्माण होत आहे.
वाढत्या वाहतूक कोंडीचे कारण पुढे करीत महापालिकेच्या स्थापनेपूर्वीपासून सुरू असलेले आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयास भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी कडाडून विरोध करीत स्वतःच्या पक्षाचे महापौर, सभापती यांना घरचा आहेर दिला आहे. आ. केणेकरांच्या आमदारकीची मुदत संपत असताना त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात दंड थोपटले आहेत. निर्णय मागे घेतला नाही तर रस्त्यावर उतरण्याची धमकी दिली आहे. बेरोजगारांना गुन्हेगारीकडे वळवणारा हा निर्णय आहे. यामुळे शहराचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. महापालिका प्रशासन आणि आ. संजय केणेकर यांच्यात नेहमीच वादाच्या ठिणग्या उडत आलेल्या आहेत. शहरातील हजारो नागरिकांना रोजगार आणि सुविधा ठरलेले आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाविरोधात भाजपच्या आमदाराने उघड दंड थोपटले आहेत. मनपा आयुक्त आणि प्रशासनाला कात्रीत पकडण्याची संधी सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका प्रशासनाने कुठलेच झोन अद्याप निर्माण केले नाहीत. विक्रेत्यांसाठी झोन निर्माण केले नाहीत. हातगाडीचे धोरण ठरवले नाही. अनेक जण रस्त्यावर दुकाने थाटून उपजीविका भागवत आहेत. अंतर्गत राजकारण तापले भाजपमध्ये अंतर्गत राजकारण तापलेले आहे. पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत घेतलेल्या पहिल्याच निर्णयास अपशकुन झाला आहे. स्वकीयांच्या विरोधात भूमिका घेणारे आ. केणेकर यांनी आपला सवतासुभा राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाला विरोध दाखवून त्यांनी ते अधोरेखित केले. आठवडी बाजाराच्या ठिकाणी फेरीवाले आठवडी बाजाराचा तसा काही फायदा नागरिकांना राहिलेला नाही. आठवडी बाजाराच्या ठिकाणी फेरीवाले ठेवले जातील. फेरीवाल्यांसाठीच्या झोनची निर्मिती लवकरच करण्यात येईल. आ. केणेकरांनी काळजी करू नये. - अनिल मकरिये, स्थायी समिती सभापती, मनपा छत्रपती संभाजीनगर.
“ऑपरेशन टायगर’च्या दहशतीखाली असलेल्या ठाकरे गटात आता अंतर्गत बंडाळीचा वणवा पेटला आहे. मातोश्रीवर पार पडलेल्या खासदारांच्या बैठकीत राज्यसभेच्या जागेवरून अभूतपूर्व हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ही जागा शरद पवारांसाठी सोडल्याने प्रियांका चतुर्वेदी यांनी थेट शड्डू ठोकला. आदित्य ठाकरेंच्या कार्यशैलीवर खासदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. बैठकीत प्रियांका चतुर्वेदी यांनी संजय राऊतांच्या भूमिकेवर थेट प्रहार केला. “संजय राऊत यांनी पवारांचे नाव का घेतले? मला माझा तीव्र निषेध नोंदवायचा आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावर उद्धव ठाकरे यांनी “पक्षप्रमुख मी आहे. निर्णय माझाच असेल,’ असे सुनावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, वादाची ठिणगी अधिकच भडकली. मराठवाड्यातील एका खासदाराने, “चतुर्वेदींना ६ वर्षे संधी देऊन पक्षाला काय फायदा झाला?” असा बोचरा सवाल केला. राऊत, आदित्य ठाकरेंत मतभेद - म्हस्के क्काची जागा पवारांच्या झोळीत टाकल्याने पक्षात संतापाची लाट आहे. एकेकाळी “ज्यांना जायचे आहे त्यांनी जा” असे ठणकावून सांगणारे ठाकरे आता “माझा तुमच्यावर विश्वास आहे” अशी आर्जवाची भाषा वापरत आहेत. प्रियांका चतुर्वेदींच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात तीव्र मतभेद उफाळून आले आहेत. त्यांच्यात मोठी खडाजंगी आणि शाब्दिक चकमक झाल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंनी राज्याचे दौरे करावेत, खासदारांचा घरचा आहेर केवळ राज्यसभेची जागाच नाही. आदित्य ठाकरेंच्या निष्क्रियतेवरूनही बैठकीत रणकंदन झाले. “उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीमुळे त्यांना मर्यादा आहेत. आदित्य ठाकरेंनी तरी एसी गाड्यांतून उतरून राज्याचे दौरे करावेत,” अशा शब्दांत खासदारांनी त्यांना घरचा आहेर दिला. या टीकेमुळे आदित्य ठाकरे इतके नाराज झाले की संपूर्ण बैठकीत त्यांनी एकाही खासदाराशी संवाद साधला नाही.
राज्यातील ४३४६ शाळांत वीज नाही, १४ हजार ८६७ शाळांत मैदाने नाहीत, ३९४ शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही, आठ हजार शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी शिकत आहेत. यू-डायस प्लस २०२५-२६ च्या अहवालानुसार विद्यार्थी संख्या एका वर्षात १ लाख २८ हजार २०९ ने घटली. ९ हजार २६६ शाळा ‘एकशिक्षकी’ असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता पट वाढवा अभियान सुरू केले आहे. पण शाळा दर्जाचा आणि सुविधांची वानवा जेव्हा दूर होईल तेव्हाच या शाळा गजबजतील. ‘गुढीपाडवा-पट वाढवा’ या राज्यस्तरीय अभियानाचे उद्घाटन नुकतेच पुण्यात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शाळांच्या पटसंख्येचा विषय चर्चेत आला. जिल्हा परिषद व शासकीय शाळा गजबजून जाव्यात आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. पण खासगी शाळांकडून ज्या सुविधा उभारल्या जात आहेत त्या तुलनेत जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांत त्या मिळत नाहीत, मग या शाळा गजबजणार कशा? असा प्रश्न विचारला जात आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून शाळा टिकवण्याचे प्रयत्न जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले, जिल्हा परिषदेच्या ३०३ मॉडेल स्कूल, २५ विद्यार्थ्यांना नासा व २५ विद्यार्थ्यांना युरोपियन स्पेस एजन्सीकडे पाठवण्याचे नियोजन आहे. आंतरराज्यीय विद्यार्थी दौरे, बाल संसद, शिक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम यासारखे उपक्रम राबवण्यात येत आहेत. ६८३ शाळांमध्ये मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह नाही- भुसे राज्यातील २९९० शाळांत विद्युत सुविधा तर ६८३ शाळांमध्ये मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याची कबुली शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. सर्व शाळांत पिण्याच्या पाण्याची सुविधा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. साडेआठ हजार शाळा अडचणीत येण्याची शक्यता ३९४ शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही, आठ हजार शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी, तर रत्नागिरी ७१३, पुण्यात ६२७, रायगड ६८२, सिंधुदुर्ग ५६९, मुंबई उपनगरातील ३६०, मुंबई शहरातील ३४, ठाण्यातील १९९, पालघरमधील १२४ शाळांतही विद्यार्थ्यांची संख्या १०च्या खालीच आहे. त्यात जिल्हानिहाय स्थिती अशी आहे - गोंदिया -२१३, भडारा-१४१, नागपूर-५५५, चंद्रपूर-४३७, गडचिरोली-६४१, वर्धा-३१८, यवतमाळ-३५०, अमरावती-३१४, अकोला-११३, वाशिम-१३३, हिंगोली-१३, नांदेड-३१४, बुलडाणा-१५८, परभणी-१२६, लातूर-२०१, धाराशिव-१७४, जालना-१८४, बीड-५३३, सोलापूर-३४१, जळगाव-१०७, छत्रपती संभाजीनगर-३४७ वर्षात एक लाख २८ हजार विद्यार्थी संख्या घटली यू-डायस प्लस २०२५-२६ च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या एका वर्षात १ लाख २८ हजार २०९ ने घटल्याचे समोर आले आहे. राज्यातील एकूण ९ हजार २६६ शाळा सध्या ‘एकशिक्षकी’ असून त्यापैकी ८ हजार ५८६ शाळा या केवळ सरकारी व्यवस्थापनाच्या आहेत. परिणामी काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
आयआरएस मोटेंकडून २ हजार कोटींचा घोटाळा- आ. पडळकर:मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी सचिन मोटे यांच्यावर २ हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा खळबळजनक आरोप केला आहे. नवी मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांच्या नावाखाली हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा दावा पडळकरांनी केला असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. पडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मोटे आणि त्यांच्या नातेवाईकांनी “डीडीएसआर’ ग्रुपच्या माध्यमातून तथागत, स्वप्नपूर्ती, अणुविश्व आणि सात्त्विक अशा विविध हाउसिंग सोसायट्या स्थापन केल्या. गुंतवणूकदारांना ९ ते १८ महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून हजारो कोटी रुपये गोळा करण्यात आले. या पैशांतून भूखंड खरेदी करून त्यावर बेकायदा सोसायट्यांचे जाळे विणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड सचिन मोटे असल्याचा दावा पडळकरांनी केला आहे. या घोटाळ्यात केवळ आयआरएस अधिकारीच नव्हे, तर सिडको, जीएसटी आणि गृहनिर्माण विभागातील काही बडे अधिकारी सामील असल्याचा संशय पडळकरांनी व्यक्त केला आहे. अश्लील व्हिडिओ आणि ब्लॅकमेलिंगचा गंभीर दावा या घोटाळ्यासोबतच पडळकरांनी एक धक्कादायक आरोप केला आहे. गुंतवणूकदारांना आणि संबंधित व्यक्तींना धमकावण्यासाठी व ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांचे महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. तसेच, विश्वास संपादन करण्यासाठी या कार्यालयांमध्ये चक्क रतन टाटा यांचा फोटो वापरून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असूनही नावामध्ये ‘ग्लोबल’, ‘इंटरनॅशनल’ किंवा ‘सीबीएसई’ असे शब्द वापरून पालकांची दिशाभूल करणाऱ्या शाळांविरुद्ध शिक्षण विभागाने दंडुका उगारला आहे. शिक्षण संचालनालयाने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी मार्च महिन्यापासून राज्यभर सुरू झाली असून, अपात्र शाळांच्या नावातील हे भपकेबाज शब्द तत्काळ वगळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काय आहेत नवे नियम? सीबीएसई : हा शब्द केवळ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत शाळांनाच वापरता येईल.इंटरनॅशनल/ग्लोबल: हे शब्द वापरण्यासाठी शाळेची परदेशातील शाखा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिकृत संलग्नता असणे अनिवार्य आहे.कठोर तपासणी: नवीन शाळांची मान्यता किंवा दर्जावाढीचे प्रस्ताव सादर करताना नावांची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. शिक्षणाच्या व्यापारीकरणाला आळा बसवणारे पाऊल पालकांनी मुलांच्या शाळेतील प्रवेशावेळी ‘इंटरनॅशनल’ किंवा ‘ग्लोबल’ नावामागील शासन परवानगीबाबत पडताळणी करावी. शिक्षण विभागाने घेतलेली भूमिका ही पहिली पायरी आहे. आता पालकांची फसवणूक थांबावी, शिक्षणातील व्यापारीकरणाला आळा बसावा, आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा शिक्षण व्यवस्थेवर बसावा यासाठी कठोर अंमलबजावणीची गरज आहे. - निशांत नारनवरे, इंग्लिश टीचर असोसिएशन, नागपूर
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारण कमालीचे तापले असून शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी थेट ‘मातोश्री’वर निशाणा साधत खळबळजनक आरोप केले आहेत. “क्रूरकर्मा खरातला पाण्याची जोडणी ही ‘मातोश्रीच्या मॅडम’च्या आग्रहाखातर देण्यात आली होती,” असा दावा करत म्हात्रे यांनी ठाकरे कुटुंबाला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या संपूर्ण प्रकरणाला त्यांनी ‘ताज का राज’असे नाव दिले असून, हा राज फुटल्यास विरोधकांच्या तोंडचे पाणी पळेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शीतल म्हात्रे यांच्या दाव्यानुसार, दक्षिण मुंबईतील ‘ताज’ हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि अशोक खरात यांच्यात एक गुप्त बैठक पार पडली होती. याच बैठकीत खरात याच्या संस्थेला नळ जोडणी देण्यावर शिक्कामोर्तब झाले. “पाइपलाइनचा जीआर काढण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमनी आदेश दिला होता की नाही? आणि त्यामागे कोणती न्यूमरॉलॉजी होती?” असा टोकदार सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. खरातला शासकीय योजनांचा लाभ नेमका कुणाच्या काळात आणि कुणाच्या मध्यस्थीने मिळाला, याचे उत्तर आता उबाठा गटाने द्यावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. दरम्यान, अंधारे यांनी वैयक्तिक पातळीवर हल्ले करू नयेत, असे प्रत्युत्तर म्हात्रेंना दिले. चोरीचे वाहन सांगण्यासाठी घ्यायचा १० हजार रुपये वाहन चोरीला गेल्यास ते शोधून देण्याच्या नावाखाली हा भोंदूबाबा नागरिकांकडून १० हजार रुपये उकळत असे. चोरीचे वाहन कोणत्या दिशेला आणि कुणाकडे मिळेल, हे सांगण्याच्या नावाखाली त्याने सर्वसामान्यांसह अनेक श्रीमंत भाविकांनाही आपल्या जाळ्यात ओढले होते. कालपर्यंत नतमस्तक होणारे आता गप्प खरातचे पाप चव्हाट्यावर आल्यानंतर आता मिरगाव परिसरात दहशतीसोबतच शांतता पसरली आहे. कालपर्यंत कॅप्टनसमोर हात जोडणारे ज्येष्ठ नागरिक आता ‘आम्हाला काही माहिती नाही’ म्हणत तोंड फिरवत आहेत. खरातच्या फार्म हाऊसची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही या प्रकरणापासून हात झटकले आहेत. स्वतःच्या कुटुंबानेही आता खरातशी असलेले नाते तोडले आहेत. त्याच्या कृत्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासावर त्यांनी खंत व्यक्त केली आहे. खरात प्रकरण : पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांना कोपरगावातून अटक अहिल्यानगर | अशोक खरातवरील गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. या गुन्ह्यातील पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथून दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी कोपरगाव ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ मार्च २०२६ रोजी कोपरगाव येथील एडब्ल्यू नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर राहुल गंगाधर शिंदे (अनिल कोल्ड्रिंक्स, कोपरगाव) याने त्याच्या मोबाइलवरून व्हिडिओ प्रसारित केले होते. पोलिसांनी तपास केला असता, राहुल शिंदे याला हे व्हिडिओ कोपरगावच्याच योगेश पंढरीनाथ आढाव याने पाठवल्याचे उघड झाले. तसेच योगेशला हे व्हिडिओ त्याचा मित्र संदीप गर्जे (रा. माजलगाव, जि. बीड) याने पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले. कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात राहुल गंगाधर शिंदे, योगेश पंढरीनाथ आढाव आणि संदीप गर्जे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अंधारेंना आमदारकी हवीय : म्हात्रे या आरोपांनंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रे यांच्यात ट्विटरवर जोरदार युद्ध रंगलं आहे. अंधारे यांनी म्हात्रे यांच्यावर खालच्या पातळीवर राजकारण केल्याचा आरोप केला, तर म्हात्रे यांनी पलटवार करताना म्हटले की, अंधारे यांना विधान परिषदेची आमदारकी हवी आहे, म्हणूनच त्यांचा हा सर्व आटापिटा सुरू आहे. खरात प्रकरणावरून सुरू झालेला हा वाद आता थेट कौटुंबिक आरोपांपर्यंत पोहोचल्याने राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. ईशान्येश्वर मंदिर आणि लागूनच असलेल्या कॅप्टन खरातच्या फार्म हाऊसची रचना पाहिली असता, दोन्ही ठिकाणचे बांधकाम एकाच वैशिष्ट्यपूर्ण दगडाने केल्याचे स्पष्ट दिसते. ज्या दगडाने सिन्नरच्या मिरगाव येथील ईशान्येश्वर महादेवाचा गाभारा आणि मंदिर उभारले गेले, त्याच पवित्र दगडाचा वापर करून लैंगिक अत्याचाराचा आरोपी कॅप्टन अशोक खरात याने आपले आलिशान फार्म हाऊस उभे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ईशान्येश्वर मंदिरासाठी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेला खास ‘देवास कोंदण’ (नेवासा दगड) खरातने स्वतःच्या खासगी साम्राज्याच्या बांधकामासाठी वापरल्याचे ‘दिव्य मराठी’ने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत उघड झाले आहे. ईशान्येश्वर मंदिर आणि लागूनच असलेल्या कॅप्टन खरातच्या फार्म हाऊसची रचना पाहिली असता, दोन्ही ठिकाणचे बांधकाम एकाच वैशिष्ट्यपूर्ण दगडाने केल्याचे स्पष्ट दिसते. खरातचे हे साम्राज्य तब्बल १७ एकर परिसरात पसरलेले आहे. तिथे ५,००० हून अधिक आंब्याची झाडे आहेत. या घनदाट झाडांच्या आडोशानेच खरात आपली अघोरी कृत्ये आणि काळी कृत्ये करत असल्याची चर्चा आता परिसरात जोर धरू लागली आहे. भाविकांच्या भक्तीचा वापर करून या भोंदूने स्वतःचे इमले उभे केले. व्हीआयपींची रांग आणि प्रेरणादायी भाषणांचा बनाव खरात हा परिसरात ‘कॅप्टन सर’ म्हणून ओळखला जायचा. १६ ऑगस्ट २०१० रोजी मंदिराची स्थापना झाल्यापासून दरवर्षी येथे १६ ऑगस्टला मोठा धार्मिक सोहळा आणि पारायण आयोजित केले जायचे. या सोहळ्याला १० हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी रांगा लावत असत. अनेक बडे राजकीय नेतेही येत असत. याच सोहळ्याचा फायदा घेऊन खरात तरुण मुला-मुलींना ‘आत्मविश्वासाने सामोरे जा’, ‘देवाची भक्ती करा’ असे सल्ले देत त्यांचा विश्वास संपादन करायचा. मात्र, याच विश्वासाचा त्याने नंतर गैरफायदा घेतल्याचे आता समोर येत आहे. मंदिर परिसरात सरकारी पैशातून झगमगाट मिरगावात शिरल्यानंतर आजही रस्ते मातीचे आणि कच्च्या स्वरूपाचे आहेत. मात्र, खरातच्या ‘शिवनिका’ संस्थेच्या ईशान्येश्वर मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉकचा थर आणि आलिशान सांस्कृतिक हॉल दिमाखात उभा आहे. विशेष म्हणजे, यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत १ कोटी रुपयांच्या निधीतून खरातसाठी पेव्हर ब्लॉकच्या परिसराचा कायापालट केलाय.
आता शेतरस्ते अडवाल तर सरकारी योजनांस मुकाल!
पाच वर्षे ठरणार अपात्र, बळीराजा योजनेत सुधारणा मुंबई : प्रतिनिधी शेत आणि पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण करणा-या किंवा रस्त्याचे नुकसान करणा-यांविरोधात आता कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली असून अशा व्यक्तींचे आधार कार्ड आणि फार्मर आय-डी तब्बल ५ वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित व्यक्ती राज्य सरकारच्या विविध योजना आणि मदतीसाठी अपात्र ठरणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा […] The post आता शेतरस्ते अडवाल तर सरकारी योजनांस मुकाल! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
क्रिकेटप्रेमींसाठी उद्यापासून आयपीएलची पर्वणी
मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाकडून यंदाच्या वर्षातील आयपीएलच्या दुस-या सत्रातील वेळापत्रक जारी करण्यात आले. यापूर्वी बीसीसीआयने पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जारी केले असून दोनच दिवसांत आयपीएलचा धुरळा उडणार आहे. २८ मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंज बंगळुरू यांच्यात बंगळुरुतील चेन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे तर स्पर्धेतील दुस-या सत्रातील सामने १३ एप्रिल […] The post क्रिकेटप्रेमींसाठी उद्यापासून आयपीएलची पर्वणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केंद्राचा दावा, मग पेट्रोल, डिझेल वाटपात मर्यादा का?, नागरिकांचा सवाल नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात इंधन टंचाईबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान केंद्र सरकारने देशातील इंधन पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असून परिस्थिती नियंत्रणात आहे, असा दावा केला आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले. देशातील सर्वच पेट्रोल पंप आणि गॅस वितरण केंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती […] The post देशात पुरेसा इंधन साठा! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
किल्लारी येथे रामनवमी उत्सवास आले यात्रेचे स्वरुप
किल्लारी : वार्ताहर किल्लारी येथे रामनवमीनिमित्त राष्ट्रीय संत मोरारीबापू यांच्या प्रेरणेतून भूकंपग्रस्तांचे मनोबल वाढविणे व भक्ती वाढविण्याच्या संकल्पनेतून कोट्यवधी रुपये खर्च करून ४ एकरमध्ये भव्य मंदीर उभारले आहे. त्यांचे श्रध्दास्थान आसलेल्या राममांदिरात रामनवमी सिताराम ट्रस्ट लातूरच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने परिसरातील जवळपास १० हजार भाविकांनी दर्शन केले. सोमवारपासून रामायण पाट, भजनाचा कार्यक्रम […] The post किल्लारी येथे रामनवमी उत्सवास आले यात्रेचे स्वरुप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दुचाकीमध्ये बसलेल्या नागाला सर्पमित्रांनी दिले जीवदान
चाकूर : प्रतिनिधी तालुक्यातील मांडूरकी या गावात इस्माईल पठाण यांच्या दुचाकीमध्ये साप गेल्याचे दिसून आले. त्यांनी ताबडतोब सर्पमित्र शिरूरकर, अल्ताफ सय्यद व शुभम भातके यांना संपर्क साधला. याची माहिती मिळताच शिरूरकर ग्रुपची टीम त्या ठिकाणी पोहचून शिताफीने या अतिविषारी नागास बाहेर काढून त्यास निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे साप थंड वातावरणाच्या […] The post दुचाकीमध्ये बसलेल्या नागाला सर्पमित्रांनी दिले जीवदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बॅडमिंटन स्पर्धेत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वर्चस्व
लातूर : प्रतिनिधी माईर एमआयटी शिक्षण संस्था समूह, लातूर यांच्या वतीने आयोजित ‘विश्वमैदान २०२६’ आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सवात पहिल्याच दिवशी रंगलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत आपले वर्चस्व सिद्ध केले. साई कृष्णा आणि नेहाल शाह यांच्या उल्लेखनीय खेळाच्या जोरावर जीएमसी संघाने विविध गटांत विजयांची मालिका कायम ठेवली. दुसरीकडे […] The post बॅडमिंटन स्पर्धेत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वर्चस्व appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
८७ व्या दिवशी ‘योग महोत्सव’ उत्साहात साजरा
लातूर : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त देशभर सुरू असलेल्या १०० दिवसीय काउंटडाउन मालिकेच्या अनुषंगाने ८७ व्या दिवशी लातूर येथील एमआयडीसी भागातील जेएसपीएम कॅम्पसमध्ये ‘योग महोत्सव’ उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र योग व प्राकृतिक चिकित्सा आयुर्विज्ञान परिषद, जेएसपीएम शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद विद्यालय लातूर व सप्तरश्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आयुष मंत्रालय व मोरारजी […] The post ८७ व्या दिवशी ‘योग महोत्सव’ उत्साहात साजरा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रशासकराज संपताच धनवर्षाव सुरू
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषद व १० पंचायत समित्यांवर मार्च २०२२ पासून प्रशासक राज असल्याने १५ व्या वित्त आयोगाचा निधी शासनाने रोखून ठेवला होता. जिल्हा परिषदेत व पंचायत समितीत सदस्य निवडूण येताच शासनाने गेल्या चार वर्षापासूनचा जो १५ व्या वित्त आयोगाचा निधी रोखून धरला होता, तो आता मोकळा करण्यास सुरूवात केली. बंधित व अबंधित […] The post प्रशासकराज संपताच धनवर्षाव सुरू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने एका आरोपीचा जामीन अर्ज रद्द केला आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकरणात, पुरवठादार कंपन्यांच्या संचालकांवर गुन्हे दाखल आहेत. आरोपी रॉबिन उर्फ हिमांशू विजयकुमार तनेजा याचा जामीन रद्द करून त्याला तत्काळ कोठडीत पाठवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या रॅकेटने नागपूर येथील शासकीय रुग्णालयासह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही बनावट औषधांचा पुरवठा केला होता. आरोपीने किमान १५ ते १६ कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचे बँक खात्यातील नोंदींवरून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची सुरुवात फेब्रुवारी २०२३ मध्ये झाली. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयातून औषध निरीक्षकांनी 'सिप्रोफ्लोक्सीन रेसीप-५००' या औषधाचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला होता. डिसेंबर २०२३ मध्ये, हे औषध बनावट असल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला. अहवालानंतर औषध निरीक्षकांनी चौकशी केली असता, हे औषध मे. जया इंटरप्रायझेस, लातूर यांच्याकडून जिल्हा शल्य चिकित्सक, नागपूर औषध भांडार येथे पुरवले गेल्याचे उघड झाले. तसेच, मे. अॅक्वेन्टिस बायोटेक प्रा. लि., नारपोली, भिवंडी यांनी मे. जया इंटरप्रायझेस, लातूर यांना पुरवठा केल्याचे समोर आले. चौकशीत असेही दिसून आले की, मे. अॅक्वेन्टिस बायोटेक प्रा. लि. यांनी बनावट औषधे मे. काबीज जनरिक हाऊस, पूनम विहार, मीरा रोड, ठाणे यांच्याकडून खरेदी केली होती. औषधांच्या कार्टन बॉक्सवर नमूद असलेली उत्पादक कंपनी मे. रेफंट फार्मा प्रा. लि., केरळ ही अस्तित्वात नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी कळमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी काबीज जनरिक हाऊसचा संचालक विजय शैलेंद्र चौधरी याला अटक केली. त्यानंतर, साखळी पुरावे जोडून रॉबिन उर्फ हिमांशू विजयकुमार तनेजा आणि त्याचा भाऊ रमन विजयकुमार तनेजा यांच्यासह द्वारिका नॅचरल फॉर्म्युलेशन या कंपनीचा मालक अमितकुमार सुरेशचंद धिमान यांनाही अटक करण्यात आली. या टोळीने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये बनावट औषधे वितरित केली होती.
विभागीय दक्षता व नियंत्रण समितीसमोर मनोधैर्य योजनेची तब्बल ८१ प्रकरणे प्रलंबित आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास गतीने पूर्ण करून गुन्ह्याची नोंद आणि पुढील चौकशी योग्यरित्या पूर्ण करावी. प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी यंत्रणांना दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षकांचे प्रतिनिधी, समाज कल्याण अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. या बैठकीत श्रीमती केदार यांनी अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गत एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या आर्थिक वर्षात दाखल प्रकरणे, मंजूर प्रकरणांच्या संदर्भात पीडितांना अर्थसहाय्याची सद्यस्थिती तसेच न्यायालयात दाखल व प्रलंबित प्रकरणांबाबत माहिती सादर केली. अमरावती विभागामध्ये या काळात एकूण ८१ प्रकरणे पोलीस स्तरावर प्रलंबित आहेत. यामध्ये अमरावती शहरातील ४, अमरावती ग्रामीणची ६, अकोला जिल्ह्याची ८, यवतमाळची १३, बुलडाणाची सर्वाधिक ३३ आणि वाशिम जिल्ह्यांतील १७ प्रकरणांचा समावेश आहे. यापैकी ३३ प्रकरणांचा पोलीस तपास पूर्ण झाला असून, दोन प्रकरणे पोलीस तपासाअंती निकाली निघाली आहेत. पोलीस तपासावरील उर्वरित ४६ प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावीत, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. ही प्रकरणे निकाली निघण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीने दरमहा नियमितपणे आढावा घ्यावा. तसेच, संबंधित जिल्हा शासकीय अभियोक्ता यांनी प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली निघतील यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. सन १९९५ ते मार्च २०२६ अखेर न्यायालयात एकूण ७ हजार ९९२ प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यापैकी ४ हजार ४२५ प्रकरणे निकाली निघाली. यातील एकूण ४४८ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून, ३ हजार ९९७ प्रकरणांमध्ये आरोपी निर्दोष सुटले आहेत. सद्यस्थितीत ३ हजार ५४७ प्रकरणे न्यायालयाच्या स्तरावर प्रलंबित आहेत. ही प्रकरणे त्वरेने निकाली निघावीत, यासाठी सर्व अधिकाऱ्यांमार्फत प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी विशेष सचिव अनिल जोशी यांनी प्रतिपादन केले की, संत गाडगे बाबांच्या विचारांची दशसूत्री आणि त्यांची सेवाभावी वृत्ती हाच मानवी जीवनाचा खरा आधार आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 'संत गाडगे बाबांची दशसूत्री आणि सेवाभावी संस्थांची भूमिका' या विषयावर आयोजित विशेष कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे होते, तर विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही.एम. मेटकर आणि श्री संत गाडगे बाबा अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे उपस्थित होते. जोशी यांनी आपल्या भाषणात गाडगेबाबांच्या 'दशसूत्री' कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी ऋणमोचन येथील घाट, विद्यार्थ्यांसाठी बांधलेली वसतिगृहे आणि स्वच्छतेचा झाडू यांसारख्या गाडगेबाबांच्या कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या मते, हा झाडू केवळ स्वच्छतेचे नाही तर मन स्वच्छ करण्याचे प्रतीक होते. अनिल जोशी पुढे म्हणाले की, संत गाडगे बाबांचे कीर्तन आणि भजन हे लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम होते. ते संत गाडगे बाबांना 'मास कम्युनिकेशनचे कुलगुरू' असे संबोधले. डॉ. व्ही.एम. मेटकर यांनी बाबांच्या दशसूत्रीचा प्रसार ही काळाची गरज असल्याचे सांगितले. माजी आमदार दिवंगत बबनराव मेटकर यांच्या पुढाकाराने आणि तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्यामुळे विद्यापीठात अध्यासन केंद्राची स्थापना झाल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी सांगितले की, संत गाडगे बाबांनी दिलेली दशसूत्री केवळ शब्दांचा समूह नसून ती निकोप समाजाच्या निर्मितीची गुरुकिल्ली आहे. दशसूत्रीचा आधार घेऊन सेवाभावी संस्था खऱ्या अर्थाने बाबांचा वारसा पुढे चालवत आहेत. या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून बाबांच्या विचार व कार्याचा प्रसार देश पातळीवर होत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. कार्यक्रमादरम्यान संत गाडगे बाबांच्या विचार व कार्यानुसार कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, नंददीप फाऊंडेशन, संत गाडगे बाबा बहुउद्देशीय संस्था, माणुसकीची भिंत सोशल फाऊंडेशन, संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघ, मातोश्री सुशिलाताई वृद्धाश्रम, संत श्री दोला महाराज वृद्धाश्रम, राजीव गांधी कृषी सेवाभावी संस्था, संत गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठान या संस्थांचा समावेश होता. तसेच श्रीमती डोईफोडे, संदीप चिस्तरकर व अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे यांचाही सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे आकाशात दर्शन:मुंबईत भव्य ‘ड्रोन शो’चा थरार!
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या “विरासत आणि विकास” या संकल्पनेनुसार राज्य शासन काम करत आहे. महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, कला, साहित्य, लोकसंगीत आणि संस्कृती आधुनिक पद्धतीने जगासमोर मांडण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि राष्ट्राभिमान यांचे भव्य व नेत्रदीपक दर्शन घडविणारा अभूतपूर्व ड्रोन शो मुंबई येथे आयोजित करण्यात आला, त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सचिव डॉ.किरण कुलकणी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे तसेच या ड्रोन शोचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेऊन सांस्कृतिक वारसा जपला जात असल्याचे मंत्री ॲङ शेलार यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील संस्कृती ही “सॉफ्ट पॉवर” म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्याची माहिती देताना मंत्री शेलार म्हणाले की, पूर्वी दरवर्षी 300-350 कार्यक्रम होत असताना आता 1200 हून अधिक कार्यक्रम राज्यभर आयोजित केले जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा विस्तार साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आल्याचे जाहीर करत त्यांनी सांगितले की, देश-विदेशात, विशेषतः मॉरिशस येथेही सार्वजनिक गणेशोत्सवाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच गणेशोत्सवाला युनेस्को च्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमात प्रथमच ड्रोन शोच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नकाशा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त विशेष सादरीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा उपक्रम प्रख्यात संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या संकल्पनेतून साकारला असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवचरित्राची गाथा आकाशात उजळणार- सचिव डॉ.किरण कुलकर्णी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला आजचा कार्यक्रम भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले. महाराष्ट्राच्या परंपरेचे वैभव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा नव्या माध्यमातून उलगडण्याचा हा अनोखा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या पराक्रम आणि कर्तृत्वाचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात, असे सांगत त्यांनी या महान व्यक्तिमत्त्वांविषयी असलेल्या आदरभावाला उजाळा दिला. “शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल किती लिहावे आणि किती बोलावे, असा प्रश्न पडतो. त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करताना कागद कमी पडतो, शब्द थिटे पडतात,” असे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने आधुनिक माध्यमांचा वापर करत आकाशाच्या विशाल पटावर शिवचरित्र उलगडण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन नागरिकांना अनुभवता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राम नवमी निमित्त आयोजित या कार्यक्रमात आकाशात चमचमणाऱ्या दिव्यांच्या माध्यमातून शिवकालीन पराक्रमाचे दृश्य साकारले जाणार असून, नागरिकांनी या अनोख्या अनुभवाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आखाती प्रदेशात उद्भवलेल्या अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे भारतासह इतर अनेक देशांत इंधन आणि नैसर्गिक वायू पुरवठ्याची साखळी कमालीच्या संकटात सापडली. सामान्य लोक गॅस सिलिंडरसाठी रांगेत ताटकळताना दिसले. मात्र केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री इंधनाबाबत काळजी करू नये असे सांगत आहेत हा विरोधाभास नव्हे काय? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनतेला या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना […] The post मध्यस्थीसाठी विलंब का? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर जिल्ह्यातून १९ लाख ७५ हजारांचा गुटखा जप्त
लातूर : प्रतिनिधी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थाविरुद्ध व्यापक मोहीम उघडली आहे. त्याअंतर्गत लातूर जिल्ह्यात दि. १६ ते २५ मार्च या कालावधीत गुटखा विक्री, साठवणुक व वाहतूक करणा-या आरोपींविरुद्ध कारवाई करुन १९ लाख ७५ हजार ९८५ रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा, वाहने जप्त केले आहे. या प्रकरणी बीएनएसअंतर्गत […] The post लातूर जिल्ह्यातून १९ लाख ७५ हजारांचा गुटखा जप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर तालुक्यातील टाकळगाव येथे रविवार, २९ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात नामवंत […] The post माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महमदापूर श्रीरामनगर येथे सत्यम रिसॉर्टचा शुभारंभ
लातूर : प्रतिनिधी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लातूर तालुक्यातील मौजे. महमदापूर पाटी येथे दि. १९ मार्च रोजी सत्यम रिसॉर्टचा शुभारंभ राज्याचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, जागृती शुगर्सचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, विकासरत्न […] The post महमदापूर श्रीरामनगर येथे सत्यम रिसॉर्टचा शुभारंभ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातुरात दोन दिवसीय ‘मानसरंग’ नाट्य महोत्सव
लातूर : प्रतिनिधी मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंवर भाष्य करणा-या ‘मानसरंग’ नाट्य महोत्सव दि. २८ व २९ मार्च महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड रिसर्च सेंटरचे संचालक – लातूरचे ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी दिली. या नाट्य महोत्सवात दोन दिवसांमध्ये एकूण चार नाटके सादर होणार आहेत. शनिवार, दि. २८ […] The post लातुरात दोन दिवसीय ‘मानसरंग’ नाट्य महोत्सव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशात इंधन टंचाईच्या चर्चेदरम्यान, ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. भारतात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, पुढील 10 ते 12 दिवसांत परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. इराणने भारतासह जगातील पाच देशांना इंधन वाहतुकीसाठी अधिकृतपणे परवानगी दिली आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता ही परवानगी देण्यात आली, ज्यामुळे इंधन पुरवठा साखळी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, काही पेट्रोल पंप बंद असल्याच्या घटना समोर येत असल्या तरी, त्यामागे इंधन तुटवडा कारणीभूत नसल्याचे दारूवाला यांनी सांगितले. सध्या पेट्रोल पंप चालकांकडून इंधनासाठी आगाऊ पेमेंटची मागणी केली जात आहे. जे चालक आगाऊ पैसे भरू शकत नाहीत, त्यांचे पंप तात्पुरते बंद ठेवले जात आहेत. सरकारला प्रति लिटर सुमारे 50 रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याने ही अॅडव्हान्स पेमेंटची अट लागू करण्यात आली आहे. मात्र, यामुळे देशात इंधन साठा कमी असल्याचा गैरसमज पसरवू नये, असे आवाहनही दारूवाला यांनी केले. एकूणच, इंधन पुरवठा व्यवस्थित असून लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे जिल्ह्यात युरिया खतांचा पुरेसा साठा उपलब्ध पुणे जिल्ह्यात युरिया खतांच्या तुटवड्याबाबत काही वृत्तसंस्थांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सध्या जिल्ह्यात युरिया खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. हंगाम 2025-26 साठी जिल्ह्याला एकूण 74,000 मेट्रिक टन युरिया खतांचे मंजूर वाटप करण्यात आले होते. त्यापैकी आजअखेर 70,249 मेट्रिक टन (95 टक्के) पुरवठा झाला असून, मागील हंगामातील 13,347 मेट्रिक टन शिल्लक साठाही उपलब्ध आहे. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामासाठी युरिया खतांची कोणतीही कमतरता भासणार नाही, असे प्रशासनाने सांगितले आहे. तालुकानिहाय साठा व पुरवठ्याचा तपशील पाहता, आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर व वेल्हा या सर्व तालुक्यांमध्ये समाधानकारक प्रमाणात खत उपलब्ध आहे. काही तालुक्यांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक पुरवठा पूर्ण झाला आहे.शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आवश्यकतेनुसारच खत खरेदी करावे व अधिक साठा करून ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. तसेच, खतांच्या वितरणावर प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवण्यात येत असून, कोणत्याही प्रकारचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राजकारणात वैयक्तिक टीका टाळा:युद्धालाही नियम असतात, कुटुंबीयांवर हल्ले करू नका- सुषमा अंधारे
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर निशाणा साधत राजकारणात वैयक्तिक टीका टाळण्याचा सल्ला दिला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, युद्धालाही काही नियम असतात आणि त्यात कुटुंबीयांवर हल्ले केले जात नाहीत. अंधारे यांनी स्पष्ट केले की, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेकदा टीका केली असली तरी त्यांच्या कुटुंबीयांविरोधात कधीही अपशब्द वापरले नाहीत. राजकारणात विविध नेत्यांमध्ये राजकीय मतभेद असले तरी एकमेकांच्या कुटुंबीयांवर हल्ले न करण्याचे संकेत आहे त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांनी हे नियम पाळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नीलम गोऱ्हे आणि इतर काही नेत्यांवर आरोप केला. हे नेते स्वतःला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यातील पक्ष संघटनाबांधणीबाबत गोऱ्हे यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. काही नेत्यांनी आपल्याला ट्रोल केले जाईल असे म्हटले होते, मात्र प्रत्यक्षात लोकांनी त्यांना गांभीर्याने घेतले नाही, अशी टीका अंधारे यांनी केली. काही नेत्यांचे उपद्रव मूल्य शून्य झाले असल्याचा घणाघातही त्यांनी केला. यावेळी त्यांनी पाणी प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे समर्थन केले. जलसंपदा मंत्री असताना त्यांनी नियमांनुसार पाणी दिले होते, त्याचा गैरवापर इतरांनी केला असल्यास त्यांना जबाबदार धरता येणार नाही, असे अंधारे म्हणाल्या. तसेच, शस्त्र परवान्याच्या मुद्द्यावर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कुटुंबीयांवर टीका करायची असल्यास राजकारणाची पातळी खालावू नये, असा इशारा देत अंधारे यांनी विरोधकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला.
राज्यात अशोक खरात प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू असतानाच, आता वसईतील एका स्वयंघोषित भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःला शंकर म्हणवून घेत मी शंकर तू माझी पार्वती आहेस असे सांगत एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या ऋषिकेश वैद्य याच्याविरुद्ध वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ पावले उचलली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील 35 वर्षीय पीडित महिलेची 2023 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून वसईतील 'आमची वसई' संस्थेचा प्रमुख आणि स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्याशी ओळख झाली होती. वैद्य याने महिलेच्या धार्मिक वृत्तीचा गैरफायदा घेत अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने जवळीक साधली आणि डिसेंबर 2023 मध्ये पुण्यात तिची भेट घेतली. यावेळी आपण 'महादेवाचा अवतार' असून 'तू माझी पार्वती आहेस' असे भासवून त्याने महिलेला भुलवले आणि पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेऊन तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, या दरम्यान त्याने पीडितेचे अश्लील छायाचित्रेही काढली होती, ज्याचा वापर करून त्याने तिचे शोषण केल्याचे समोर आले आहे. आरोपी ऋषिकेश वैद्य याने काढलेल्या अश्लील छायाचित्रांच्या आधारे पीडित महिलेला ब्लॅकमेल करून पुन्हा भेटीसाठी दबाव टाकला. मे 2025 मध्ये वसईतील 'हॉटेल एक्सप्रेस इन' येथे तिला बोलावून पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाची बातमी समोर आल्यानंतर पीडितेने हिंमत एकवटून घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडल्याने तांत्रिक कारणास्तव हे प्रकरण पुढील तपासासाठी पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. माणिकपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पीडित महिलेने असाही खळबळजनक दावा केला आहे की, ऋषिकेश वैद्य याने स्वतःला धर्मगुरू भासवून अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढले असून त्यांचे लैंगिक शोषण केले आहे. 'आमची वसई' या संस्थेचा बुरखा पांघरून अध्यात्माच्या नावाखाली चालणाऱ्या या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, पोलिस आता इतर संभाव्य पीडितांचा शोध घेत आहेत.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयातर्फे 'टीबी मुक्त भारत अभियान' फेज २ चे उद्घाटन २६ मार्च रोजी करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजिता महापात्र यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला. भारत सरकारच्या 'टीबी मुक्त भारत' या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टपूर्तीसाठी या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. क्षयरोगाचे लवकर निदान, सर्व रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार, औषधोपचार पूर्ण करण्यावर भर देणे, क्षय रुग्णांचे विशेष व्यवस्थापन आणि संपर्कातील व्यक्तींची तपासणी करणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. यासोबतच, टीबी प्रतिबंधात्मक उपचार वाढविणे, घराघरात जाऊन टीबी स्क्रीनिंग व सर्वेक्षण करणे आणि जलद तपासणी करणे यावरही भर दिला जाईल. कुपोषित रुग्णांसाठी पोषण सहाय्य, 'निक्षय मित्र' उपक्रमाद्वारे सामाजिक सहभाग वाढवणे, एचआयव्ही, मधुमेह आणि कुपोषण यांसारख्या उच्च जोखमीच्या गटांवर विशेष लक्ष केंद्रित करणे हे या अभियानाचे प्रमुख उपक्रम असतील. खाजगी वैद्यकीय क्षेत्राचा सक्रिय सहभाग देखील अपेक्षित आहे. यावेळी बोलताना सीईओ संजिता महापात्र यांनी सांगितले की, टीबी निर्मूलनासाठी केवळ आरोग्य विभागच नव्हे, तर संपूर्ण समाजाने एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. 'टीबी हरेल देश जिंकेल' या घोषवाक्याखाली सर्वांनी एकत्र येऊन टीबीमुक्त भारत घडविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. ज्योत्स्ना पोटपिटे, जिल्हा क्षय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पवार आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. रुपाली कोरडे व डॉ. संदीप सुखसोहळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विशाल धांडे यांनी केले, तर पुरुषोत्तम खडसे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गो. ग. राठी शासकीय क्षयरोग रुग्णालय आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात शहीद दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात प्रा. मधुकर जाधव यांनी 'शहीदांच्या स्वप्नातील भारत' या विषयावर मार्गदर्शन केले. देशहिताचे कार्य, राष्ट्रीय एकात्मता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून बुध्दीप्रामाण्यवादी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. हे व्याख्यान विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे होते. अधिसभा सदस्य नितीन टाले व कैलास चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. निलेश कडू आणि विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात प्रा. जाधव यांनी लाला लजपतराय यांच्या विचारांचा भगतसिंगांवर कसा प्रभाव होता, हे सांगितले. लाला लजपतराय यांच्या निधनानंतर भगतसिंग व्यथित झाले आणि त्यांनी त्याचा बदला घेतला. असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यामागे भारतीयांचे विचार ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हेतू होता, जीवितहानी करण्याचा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भगतसिंगांनी अटक करवून घेतल्यानंतर कारागृहात भारतीयांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीविरोधात उपोषण केले होते. ब्रिटिश काळात भारतीयांना प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावे लागत होते, तसेच बाबू गेणू यांनीही भारतातील कच्चा माल ब्रिटिशांना नेण्यास विरोध केला होता. या उदाहरणांवरून स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचे महत्त्व प्रा. जाधव यांनी अधोरेखित केले. आजच्या युवकांनी आपले ज्ञान आणि कौशल्य समाजहित व देशहितासाठी वापरावे, शहीदांचे चरित्र वाचावे आणि त्यांचे विचार आत्मसात करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

36 C