चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा पेच अद्याप कायम असून, यावर अंतिम तोडगा काढण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आज (२७ जानेवारी) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी काँग्रेसगचा एक गट भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. चंद्रपूरच्या राजकारणात मुनगंटीवार यांचा शब्द अंतिम मानला जात असल्याने, त्यांच्या संमतीशिवाय महापौरपदाचा कोणताही निर्णय न घेण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि 'वंचित'सोबत भाजपचा संवाद सुरू होता. भाजपने ठाकरे गटाला उपमहापौरपद आणि दोन वर्षांसाठी स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, ठाकरे गटाने अचानक महापौरपदाची मागणी केल्याने चर्चा फिस्कटल्याची माहिती समोर आली आहे. सुधीर मुनगंटीवार हे ठाकरेंच्या शिवसेनेला महापौरपद देण्यास अनुकूल नसल्याचे समजते. आजच्या चर्चेत मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्याशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मुनगंटीवारांचा काँग्रेसबाबत खळबळजनक दावा मुंबईला रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा दावा केला आहे. काँग्रेसचा एक मोठा गट आमच्या संपर्कात असून, त्यांच्यातील अनेक नगरसेवकांची भाजपसोबत येण्याची इच्छा आहे. जर ही चर्चा यशस्वी झाली, तर निश्चितपणे चंद्रपूरचा महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे चंद्रपूरच्या सत्तेत काँग्रेसच्या मदतीने भाजप नवीन चमत्कार घडवणार का? अशी चर्चा रंगली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपचा महापौर हवा मुनगंटीवार यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करताना जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दा मांडला. गेल्या १० वर्षांत आम्ही चंद्रपूरच्या प्रगतीसाठी प्रचंड प्रयत्न केले आहेत. सध्या जिल्ह्यात २३ ते २४ महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. हे प्रकल्प सुरळीत पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेत भाजपचाच महापौर असणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच त्यांनी अचानक महापौरपदाची मागणी केल्याने पेच निर्माण झाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. चंद्रपुरातील पक्षीय बलाबल दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपाचे २४ नगरसेवक आहेत, तर शिवसेना ठाकरे गटाचे ६ नगरसेवक आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडी दोन आणि अपक्ष दोन असे १० नगरसेवक होतात. भाजपाचे २४ आणि ठाकरे गट, वंचित, अपक्ष असे १० नगरसेवक मिळून ३४ चा बहुमताचा आकडा गाठला जाऊ शकतो.
हिंगोली जिल्ह्यातील साखरा येथील रहिवासी असलेले पिंपरी चिंचवड पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे. त्यांच्या यशामुळे हिंगोली जिल्हयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला असून त्यांच्या यशाबद्दल गावकऱ्यांनी जल्लोष केला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पिंपरी चिंचवड येथील सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांचे प्राथमिक शिक्षण साखरा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले तर तर माध्यमिक शिक्षण हिंगोली शहरात पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागातून जिद्दीच्या जोरावर पोलीस दलात वरिष्ठ पदापर्यंत पोहोचलेल्या कुबडे यांनी १९९३ मध्ये पोलिस दलात प्रवेश केला. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांनी नक्षलग्रस्त भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी बजावली त्यांच्या कामाची दखल घेऊन सन २०१८ मध्ये त्यांना पहिल्यांदा गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले होते. त्यानंतर गुन्हे शाखा आणि विविध पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम करताना त्यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. विशेषतः तडीपार, मोकोका व स्थानबध्दतेच्या कारवायांमध्ये त्यांची भुमीका महत्वाची ठरली आहे. पोलिस दलातील अतिशय कर्तव्यदक्ष व शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या कुबडे यांना दुसऱ्यांचा राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे. त्यांच्या यशाबद्दल हिंगोलीसह साखरा येथील गावकऱ्यांनी जल्लोष करून त्यांचे अभिनंदन केले आहे. कुबडे यांना मिळाले १२०० पेक्षा अधिक पारितोषीक पोलिस दलात गंभीर गुन्हयांची उकल करणे, गुन्हेगारांना अटक करणे यासह इतर कामगिरी बद्दल त्यांना आतापर्यंत तब्बल १२०० पेक्षा अधिक पारितोषिक मिळाले आहेत. या शिवाय साडेचारशे पेक्षा अधिक प्रशांसापत्र मिळाले आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे. त्यांच्या यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी ता. २६ त्यांचा पिंपरी चिंचवड येथे सत्कार करण्यात आला.
वसमत ते औंढा नागनाथ मार्गावर चोंढीफाटा शिवारात वाळूची अवैध वाहतूक करणारे टिप्पर पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने मंगळवारी ता. २७ पहाटे पकडले असून टिप्पर व वाळू असा सुमारे २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्हयात वाळूचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभागाचे तर पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी पोलिस विभागाचे पथक नियुक्त केले आहे. या पथकाकडून दररोज वाळू घाटाकडे जाणाऱ्या मार्गावर पाहणी केली जात आहे. त्यामुळे जिल्हयातील वाळू वाहतूकीला काहीसा लगाम बसला आहे. दरम्यान, जिल्हयातून वाळू वाहतूक रोखली जात असतांना आता जिल्हयात नांदेड भागातून वाळू आणली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय रोखण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक दशरथ तलेदवार यांचे पथक स्थापन केले आहे. या पथकाकडून नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या भागात अवैध व्यवसायाची माहिती घेऊन त्यावर छापे टाकले जात आहेत. दरम्यान, नांदेड कडून एका टिप्परमध्ये वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यावरून जमादार खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ, कामाजी गवळी यांच्या पथकाने वाहनाचा माग काढण्यास सुरवात केली. सदर टिप्पर वसमत ते औंढा नागनाथ मार्गावर चोंढी शिवारात असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास छापा टाकून टिप्पर ताब्यात घेतले. टिप्पर चालकाकडे विचारणा केल्यानंतर त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी टिप्पर व वाळू असा २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक हनुमंत धतुरे यांच्या तक्रारीवरून टिप्पर चालक मंगेश खैरे (रा. गिरगाव, ता. वसमत), मालक विलास कल्याणकर (रा. महादेव पिंपळगाव, जि. नांदेड) यांच्या विरुध्द कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार भगवान वडकिले पुढील तपास करीत आहेत. दरम्यान या पथकाने औंढा नागनाथ शिवारातही एक टिपर पकडल्याचे सूत्रांनी सांगितले या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याने हिवाळा संपत आल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत जाणवत असलेली कडाक्याची थंडी आता हळूहळू कमी होत असून अनेक भागांत दिवसाचे तापमान वाढू लागले आहे. सकाळच्या वेळेत काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि धुक्याची दाटी जाणवत आहे. या बदलत्या हवामानात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये हवामानाबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. हिवाळ्याच्या शेवटी पावसाचा अनुभव येत असल्याने लोकांनाही ऋतू बदलाची जाणीव ठळकपणे होत आहे. गेल्या 24 तासांत राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. ठाणे, नंदूरबार आणि रायगड जिल्ह्यांतील काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. या पावसामुळे वातावरण ढगाळ राहिले असून थंडीचा कडाका जवळपास नाहीसा झाल्याचे चित्र आहे. पुणे, मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच आकाश ढगांनी व्यापलेले होते. हवेतील आर्द्रता वाढल्याने गारठ्याची तीव्रता कमी झाली असून काही ठिकाणी दमट हवामान जाणवत आहे. हवामान खात्याने पुढील काही तासांत पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता व्यक्त केल्याने नागरिक सतर्क झाले आहेत. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे सक्रिय झाले आहेत. या वार्यांचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होत असून त्यामुळे ढगांची दाटी आणि अवकाळी पावसाची शक्यता वाढली आहे. या बदलामुळे किमान तापमानात वाढ झाली असून हुडहुडी भरवणारा गारठा सध्या ओसरल्याचे दिसून येत आहे. पुढील 24 तास राज्यात ढगाळ आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी पावसाच्या सरी पडू शकतात, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात पहाटे चार वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पेण तालुक्यातील जोहे आणि हमरापूर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे स्थानिक नागरिकांची एकच धावपळ उडाली. विशेषतः पेणमधील गणपती मूर्ती कारखाने आणि वीटभट्ट्यांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कच्च्या अवस्थेतील गणपती मूर्ती तसेच वीटभट्ट्यांवरील विटा पावसामुळे खराब होण्याची शक्यता असून कारागिरांचे मोठे नुकसान होऊ शकते. ठाणे जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा अनुभव नागरिकांनी घेतला. ठाण्यातील घोडबंदर रोड आणि आसपासच्या परिसरात सकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरण अनुभवायला मिळाल्याने ठाणेकर आश्चर्यचकित झाले. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहतूक मंदावली तर बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान खात्याने यापूर्वीच पावसाचा इशारा दिलेला असल्याने काही प्रमाणात लोकांनी खबरदारी घेतली होती, तरीही पावसाचा जोर पाहून अनेकांची गैरसोय झाली. रायगड, ठाणे आणि नवी मुंबई या भागांत पावसाच्या सरी नवी मुंबईतही सकाळच्या वेळेत अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. थंडीच्या मौसमात पावसामुळे हवेतील गारवा काही प्रमाणात वाढल्याचे जाणवले. ऑफिसला जाणारे कर्मचारी, शाळेत जाणारी मुले आणि कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक अचानक आलेल्या पावसामुळे अडचणीत सापडले. रायगड, ठाणे आणि नवी मुंबई या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसल्याने वातावरणात बदल झाला असून नागरिकांना हिवाळा की पावसाळा, असा प्रश्न पडल्याचे चित्र दिसून आले. हवामानाचा लहरीपणा वाढला भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातही थंडीच्या दिवसांत अचानक पावसाने हजेरी लावली. जानेवारी महिना संपत असतानाच सकाळी हवामानात अचानक बदल झाला आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. सकाळच्या वेळेत अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी किंवा मुलांना शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर पडले असताना पावसामुळे त्यांची धावपळ उडाली. जून-जुलै महिन्यांची आठवण करून देणारा हा पाऊस जानेवारीत पडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकूणच राज्यभर हवामानाचा लहरीपणा वाढला असून, पुढील काही दिवसांतही अशाच प्रकारचे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मरिन ड्राईव्ह येथील ऐतिहासिक विल्सन जिमखान्याचा भूखंड राज्य सरकारने 'जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन' या संस्थेला ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या संस्थेने ताबा मिळवताच जिमखान्याचे नाव बदलून 'जैन जिमखाना' असा फलक लावल्याने स्थानिक गिरगावकर आणि विल्सन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाविरोधात आता मोठे जनआंदोलन उभे राहिले असून, येत्या २ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता आझाद मैदानावर महामोर्चा काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विल्सन महाविद्यालयाकडे अनेक वर्षांपासून असलेला या जिमखान्याचा करार २०२३ मध्ये संपुष्टात आला होता. सुमारे एक लाख चौरस फुटांचा हा मोक्याचा भूखंड मोकळा होताच, राज्य सरकारने तो एका जैन संस्थेच्या स्वाधीन केला. मात्र, ताबा मिळताच त्या ठिकाणी धार्मिक उपक्रम सुरू झाल्याने आणि नामकरण बदलल्याने स्थानिक मुलांच्या खेळाच्या हक्कावर गदा आल्याची भावना व्यक्त होत आहे. या निर्णयाच्या विरोधात 'आम्ही गिरगावकर' ही स्थानिक संस्था आणि विल्सन महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. मैदान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू 'आम्ही गिरगावकर' या स्थानिक संघटनेने या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मुंबईत बोटावर मोजण्याइतपत मोकळ्या जागा उरल्या आहेत. विल्सन जिमखान्याचा वापर मुंबईकर खेळाडूंसाठी आणि विद्यार्थ्यांसाठीच व्हायला हवा. तिथे कबड्डी, खो-खो आणि मल्लखांब यांसारख्या मातीतल्या खेळांचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी ही जागा मराठी संस्थेला द्यावी, अशी मागणी गिरगाव टीमने केली आहे. सोशल मीडियावर 'वॉर' सुरू अरे कोण बोलतोय, देणार नाय..!! आता विल्सन जिमखाना परत घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परप्रांतीय संस्थांच्या माध्यमातून स्थानिक मैदाने हडप केली जात असल्याचा आरोप करत, सर्व पक्षांतील पदाधिकारी, खेळाडू आणि विल्सन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी २ फेब्रुवारीच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जर आज आपण गप्प बसलो, तर हे लोक उद्या विभागातील सुलभ शौचालयेही गिळायला मागे-पुढे पाहणार नाहीत, अशा तिखट शब्दांत 'आम्ही गिरगावकर' टीमने आपला संताप व्यक्त केला आहे. धार्मिक की क्रीडा उपक्रम? जिमखान्याचे नामकरण बदलल्यानंतर या ठिकाणी केवळ एका विशिष्ट समाजाचे धार्मिक कार्यक्रम सुरू झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या जागेचे अस्तित्व धोक्यात आल्याचे सांगत, विल्सन जिमखाना जिवंत राखण्यासाठी आता गिरगावकर आरपारच्या लढाईच्या तयारीत आहेत. विल्सन जिमखान्यावरून पेटलेला हा वाद आता केवळ जागेचा उरला नसून तो मुंबईच्या मोकळ्या जागांच्या संरक्षणाचा लढा बनला आहे. २ फेब्रुवारीच्या आंदोलनानंतर राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कयाधू नदीचे पाणी खरबी बंधाऱ्यातून इसापूर कडे वळविण्याचे काम सुरु असून त्यास स्थगिती का देत नाहीत या प्रश्नावर काम थांबविण्यापेक्षा पर्याय शोधू असे सांगत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी या कामाला स्थगिती देण्यास अप्रत्यक्ष नकार दिला आहे. जिल्ह्याच्या सिंचनाच्या प्रश्नावर बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी पत्रकारांशी बोलतांना दिले आहे. प्रजासत्ताक दिना निमित्ताने पालकमंत्री झिरवाळ हिंगोलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राजेश नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी हिंगोलीच्या कयाधूचे पाणी खरबी येथील बंधाऱ्यातून १०० फुट खोल बंधाऱ्याचे काम करून इसापूर धरणात नेला जात आहे. त्याचा हिंगोलीकरांना फायदा होणार नाही उलट जिल्हयाचे वाळवंट होईल. त्यामुळे या कामाला स्थागिती का देत नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला. काम थांबविण्यापेक्षा त्याला पर्याय शोधू आमचे पाणी नेले जात असेल तर आम्हाला काय देणार असा प्रश्न सरकार समोर मांडूत. त्यासाठी जिल्हयातील लोकप्रतिनिधींची अधिवेशन काळात बैठक घेतली जाईल असे पालकमंत्री झिरवाळ यांनी सांगितले. मात्र त्यांनी कामाला स्थगिती देण्यास अप्रत्यक्ष नकारच दिला. या कामाला थेट विरोध करणे हे योग्य नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. येलदरीच्या डाव्या कालव्याच्या प्रश्नावर त्यांनी या बैठकीतच जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय जिल्हयातील मागील अनेक दिवसांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हयात शाळा, अंगणवाडी बांधकाम, वैद्यकिय महाविद्यालय, स्मशानभुमीच्या जागेचा प्रश्न यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी देणार आहोत. मात्र त्यानंतरही शासनाकडून आणखी काही अतिरिक्त निधी मिळेल काय यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात लाडक्या बहिणीच्या ई केवायसीला मुदतवाढ मिळेल पण त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे झिरवाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरू असतानाच मुंबई आणि भिवंडी येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या, पण तितक्याच धक्कादायक घटनांनी सर्वांनाच हादरवून टाकले आहे. मुंबईतील विक्रोळी टागोर नगर परिसरात निष्काळजीपणामुळे एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला, तर भिवंडीत घरगुती वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांमुळे कायदा-सुव्यवस्था, निष्काळजीपणा आणि वाढत्या हिंसाचारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एकीकडे उत्सवाच्या तयारीतून झालेली दुर्घटना, तर दुसरीकडे कौटुंबिक वादातून झालेला खून, अशा दोन घटनांनी समाजमन सुन्न झाले आहे. मुंबईतील विक्रोळी टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमासाठी लावण्यात आलेला मोठा स्पीकर अचानक कोसळून एका तीन वर्षांच्या मुलीवर पडला. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून, त्यात स्पीकर पडताच चिमुकली खाली अडकताना दिसत आहे. या घटनेत ती गंभीर जखमी झाली होती. तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, चिंध्या गोळा करणाऱ्या एका व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे हा स्पीकर हलल्याचा आणि अपघात घडल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण पसरले असून, विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान लावण्यात येणाऱ्या स्पीकर्स, मंडप आणि इतर साहित्याची सुरक्षितता तपासली जाते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एका निष्पाप चिमुकलीचा बळी गेल्यानंतरही जबाबदारी नेमकी कोणाची, यावर चर्चा सुरू आहे. स्थानिक रहिवाशांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली जात आहे. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा निर्घृण खून दरम्यान, भिवंडी शहरातूनही तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीतील न्यू आझाद नगर, शांतीनगर परिसरात नवरा-बायकोच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. मामा हॉटेलजवळील न्यू आझादनगर झोपडपट्टीत ही घटना घडली. दिलशाद शहा असे मृत तरुणाचे नाव असून, तो आपल्या मावस बहिणी आणि तिच्या पतीमधील कौटुंबिक वाद शांत करण्यासाठी गेला होता. मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून बहिणीच्या पतीचे भाऊ आसिफ अब्दुलहकीम शहा, अलिहसन अब्दुलहकीम शहा आणि मुजफ्फर अब्दुलहकीम शहा यांनी संगनमत करून दिलशाद शहा याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दिलशाद शहा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने भिवंडीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातूनच ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपी आणि मृतक हे परस्पर नातेवाईक असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही घटनांमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरू आहे.
नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे उमेदवार प्रचारात व्यस्त झाले आहेत. मात्र, निवडणुकीच्या या धावपळीत सांगली जिल्ह्यातील विटा शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात काळी जादू आणि भानामतीचा प्रकार समोर आल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत कठोर भूमिका घेतली आहे. विटा शहरात भाजपाचे माजी आमदार सदाशिव पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या घरासमोर काळी जादू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका बंगाली भोंदू बाबाने आणि त्याच्या स्थानिक साथीदाराने घरासमोर भानामतीसाठी वापरले जाणारे साहित्य टाकल्याचे समोर आले. सुरुवातीला हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नव्हता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संपूर्ण घटना स्पष्ट झाली. फुटेजमध्ये संबंधित व्यक्ती साहित्य टाकून निघून जाताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा अंधश्रद्धेच्या प्रकारामुळे लोकांमध्ये भीती पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही बाब लक्षात येताच सदाशिव पाटील यांच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी बंगाली भोंदू बाबासह त्याला मदत करणाऱ्या स्थानिक व्यक्तीला शोधून काढले. संतप्त नागरिकांनी दोघांना बेदम चोप दिला आणि शहरातून त्यांची धिंड काढली. या घटनेमुळे काही काळ विटा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर नागरिकांनी दोघांनाही विटा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील अनर्थ टाळला. या प्रकरणानंतर पोलिसांकडून संबंधित दोघांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या काळात भाजपाच्या माजी आमदाराच्या घरासमोर झालेल्या या काळ्या जादूच्या प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा प्रकार नेमका कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या उद्देशाने करण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे. विटा पोलिसांनी या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, सखोल तपास केला जात आहे. निवडणूक काळात समाजात गैरसमज, भीती आणि अस्थिरता निर्माण करणाऱ्या अशा घटनांकडे पोलिसांनी गंभीरपणे पाहण्यास सुरुवात केली आहे. भीती न बाळगण्याचे आवाहन दरम्यान, या प्रकरणावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही प्रतिक्रिया दिली आहे. समितीचे कार्यकर्ते संजय बनसोडे यांनी नागरिकांना आणि उमेदवारांना आवाहन करत सांगितले की, अंधश्रद्धेचा आधार घेऊन कोणीही निवडणूक जिंकू शकत नाही. लोकशाहीत विजय हा जनतेच्या विश्वासावर मिळतो, काळी जादू किंवा भानामतीवर नाही. अशा प्रकारांना भीक न देता नागरिकांनी जागरूक राहावे आणि भीती न बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले. या घटनेनंतर निवडणुकीच्या प्रचारात अंधश्रद्धा आणि गैरप्रकारांवर आळा घालण्याची मागणी जोर धरू लागली असून, प्रशासनाकडूनही अधिक दक्षता घेतली जात आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख न केल्याचा आरोप होताच नाशिकमध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात एका महिला वनकर्मचाऱ्याने थेट घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवला. या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेचे पडसाद राजकीय आणि सामाजिक स्तरावरही उमटू लागले आहेत. बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा मुद्दा पुढे येताच आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या, तर विरोधी पक्षांनीही महाजनांवर जोरदार टीका सुरू केली. दुसरीकडे, गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला असला तरी आंदोलन आणि निषेधाची धार अद्याप कायम आहे. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजवंदन सोहळा गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर त्यांनी केलेल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख नसल्याचा आरोप करण्यात आला. याच मुद्द्यावर माधवी जाधव या महिला वनकर्मचाऱ्याने कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी केली. बाबासाहेबांचा नामोल्लेख कसा काय टाळला? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. वर्दीत असतानाच मंत्र्यांना जाहीर प्रश्न विचारल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की काही काळ कार्यक्रमस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. निलंबन झाले तरी चालेल, पण बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका माधवी जाधव यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे हा प्रकार केवळ एका भाषणापुरता मर्यादित न राहता मोठ्या वादात बदलला. आंबेडकरी संघटना आणि भीम सैनिक रस्त्यावर या घटनेची माहिती पसरताच नाशिकमधील आंबेडकरी संघटना आणि भीम सैनिक रस्त्यावर उतरले. गिरीश महाजन यांनी जाहीर माफी मागावी, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही या मुद्द्यावर महाजनांवर टीकास्त्र सोडले. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी, संविधानाला मानणाऱ्यांचे हे वर्तन नाही, असा आरोप करत सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चेतन गांगुर्डे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देत, महाजनांची मानसिकता बाबासाहेबांच्या विचारांशी विसंगत असल्याचा आरोप केला. दरम्यान, माधवी जाधव यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही दिला, त्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला. 40 वर्षांपासून आंबेडकर जयंतीनिमित्त उपक्रमांमध्ये सहभागी - महाजन वाद अधिक चिघळत असतानाच गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या घोषणाबाजीची मोठी चर्चा सुरू असताना, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर महाजन म्हणाले की, भाषणात चुकून बाबासाहेबांचा उल्लेख राहून गेला असेल तर त्याबद्दल ते दिलगिरी व्यक्त करतात. त्यानंतर रात्री त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते म्हणूनच आपण आहोत, असे म्हणत त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांप्रती आपली निष्ठा दर्शवली. भाजपचे संस्कार बाबासाहेबांचे विचार जपणारे असल्याचे सांगत, आपण स्वतः गेल्या 40 वर्षांपासून आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. या पोस्टसोबत त्यांनी आपल्या भाषणाची क्लिपही शेअर केली आहे. दिलगिरीनंतरही वाद पूर्णपणे शांत झालेला नाही मात्र, गिरीश महाजनांच्या दिलगिरीनंतरही वाद पूर्णपणे शांत झालेला नाही. शासकीय कर्मचारी, तीही महिला, अशा प्रकारे थेट मंत्र्यांना जाहीरपणे सवाल करताना सहसा दिसत नाही, मात्र बाबासाहेबांच्या नामोल्लेखाचा मुद्दा असल्याने माधवी जाधव यांनी घेतलेली भूमिका अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या धाडसाची चर्चा वनविभागासह इतर शासकीय कर्मचाऱ्यांमध्येही सुरू आहे. दुसरीकडे, आंदोलनाची भूमिका घेतलेल्या आंबेडकरी संघटनांनी हा विषय केवळ एका चुकापुरता मर्यादित न ठेवता, बाबासाहेबांच्या सन्मानाशी जोडलेला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिलगिरीनंतरही हा वाद राजकीय आणि सामाजिक पातळीवर आणखी किती काळ तापणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. या सन्मानाला विरोध करणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पलटवार करत टीकाकारांना कोत्या मनाचे लोक असे संबोधले आहे. कोश्यारी यांचे आयुष्य दीर्घकाळ सार्वजनिक सेवेला वाहिलेले असून त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला असून, पद्मभूषण पुरस्काराचा मुद्दा आता थेट लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडला जात आहे. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पद्म पुरस्कारांची घोषणा करत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण देण्याचा निर्णय घेतला. कोश्यारी यांनी 2019 ते 2023 या कालावधीत महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली होती. या निर्णयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी कोश्यारी यांच्यावर महाविकास आघाडी सरकार पाडण्यात सक्रिय भूमिका बजावल्याचा आरोप केला. राऊत यांच्या मते, निवडून आलेल्या सरकारला अस्थिर करून भाजपचे सरकार सत्तेत आणण्यासाठी कोश्यारी यांनी घटनात्मक पदाचा गैरवापर केला आणि त्यामुळे लोकशाही व संविधानाची हत्या झाली. संजय राऊत यांनी पुढे दावा केला की, कोश्यारी यांच्या कार्यकाळात त्यांच्या अनेक निर्णयांवर सर्वोच्च न्यायालयानेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि काही निर्णय बेकायदेशीर ठरवले होते. अशा पार्श्वभूमीवर अशा व्यक्तीला पद्मभूषणसारखा सन्मान देणे हे देशासाठी चुकीचा संदेश देणारे असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी माध्यमांशी बोलताना कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा मुद्दाही पुन्हा उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे कोश्यारी यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. त्या वक्तव्यानंतर राज्यभर आंदोलनं झाली होती आणि विविध संघटनांनी निषेध नोंदवला होता. याचबरोबर संजय राऊत यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी कोश्यारी यांनी केलेल्या विधानांवरही टीका केली. समाजसुधारकांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान होणे हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का देणारे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी महायुती सरकारने या निर्णयाला विरोध करायला हवा होता, अशी अपेक्षाही राऊत यांनी व्यक्त केली. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कोश्यारी यांना त्यांच्या कार्यासाठीच पुरस्कार या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ठाम भूमिका घेतली. त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांचे अभिनंदन करत त्यांच्या दीर्घ आणि सन्माननीय सार्वजनिक जीवनाचा उल्लेख केला. देशसेवेसाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असून ते पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, ज्यांचे विचार संकुचित आहेत, असेच लोक अशा सन्मानाला विरोध करतात. कोश्यारी यांना त्यांच्या कार्यासाठीच हा पुरस्कार मिळाला असून त्यामागे कोणतेही राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पलटवारानंतर पद्मभूषण पुरस्काराचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनजवळील सोरतापवाडी येथे सासरच्या छळाला कंटाळून एका इंजिनिअर विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीप्ती मगर चौधरी असे मृत विवाहितेचे नाव असून तिने काल रात्री गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीसमोरच हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली असून या घटनेने समाजमन हेलावून गेले आहे. आत्महत्येप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी पती, दीर तसेच सासू-सासरे अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीप्ती चौधरी यांचा विवाह 2019 मध्ये झाला होता. विवाहानंतर सुरुवातीपासूनच तिला सासरकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सासरच्या मंडळींकडून तिच्या चारित्र्यावर संशय घेणे, दिसण्यावरून टोमणे मारणे तसेच घरकाम येत नाही अशा कारणांवरून सतत अपमान केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या सततच्या तणावामुळे दीप्ती मानसिकदृष्ट्या खचली होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, संसार टिकावा आणि मुलीचे भवितव्य सुरक्षित राहावे म्हणून दीप्तीने अनेक वेळा सहनशीलतेची भूमिका घेतली होती. या प्रकरणात हुंड्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. लग्नाच्या वेळी मुलीच्या कुटुंबाकडून 50 तोळे सोने देण्यात आले होते. याशिवाय वाहन खरेदीसाठी 25 लाख रुपये देण्यात आल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर नंतरही सासरच्यांच्या मागणीनुसार एकदा 10 लाख रुपये रोख स्वरूपात देण्यात आले होते, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र, एवढे करूनही छळ थांबला नाही. पैशांच्या आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली दीप्ती अधिकच अडकत गेली आणि अखेर या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर उरुळी कांचन पोलिसांनी तातडीने कारवाई करत पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सासू आणि पतीला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, मृत विवाहितेची सासू सुनीता चौधरी या ऑक्टोबर 2025 मध्ये सोरतापवाडीच्या सरपंच झाल्या होत्या, तर सासरे शिक्षक असल्याची माहिती आहे. सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींवर असे गंभीर आरोप झाल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले दरम्यान, या घटनेचा तपास लोणी काळभोर पोलिस करत असून आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींची तपासणी केली जात आहे. हुंडाबळी आणि कौटुंबिक छळाच्या घटनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शिक्षित आणि नोकरी करणाऱ्या महिलांनाही अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते, ही बाब चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दीप्तीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावरील शरद नगर येथे आज सायंकाळी एक अतिशय भीषण अपघात झाला. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन रेल्वे पकडण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या क्रूझर जीपला समोरून येणाऱ्या कंटेनरने जोराची धडक दिली. या समोरासमोर झालेल्या धडकेत डोंबिवली (जि. ठाणे) येथील चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. योगिनी अमोल केकाने (रा. डोंबिवली), सविता संतोष गुप्ता (रा. डोंबिवली), राजश्री कदम (रा. डोंबिवली), आदित्य अजय गुप्ता (वय १४ वर्षे, रा. डोंबिवली), अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व भाविक ठाणे जिल्ह्याचे रहिवासी असून सुट्ट्यांच्या निमित्ताने देवदर्शनासाठी आले होते. त्यांनी ठाण्याहून सोलापूरला रेल्वेने प्रवास केला. सकाळी सोलापूरला पोहोचल्यावर त्यांनी अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. त्यानंतर अक्कलकोटवरून भाड्याने क्रूझर जीप (MH 13 BN 7687) करून ते पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले. पांडुरंगाचे दर्शन घेऊन सायंकाळी पुन्हा रेल्वे पकडण्यासाठी सोलापूरच्या दिशेने जात असतानाच शरद नगर येथे त्यांच्या गाडीला कंटेनरने (MH 46 BU 6651) जोरदार धडक दिली. मृतदेहांची ओळख पटवणेही झाले कठीण अपघात इतका भीषण होता की क्रूझर जीपचा अक्षरशः चक्काचूर झाला. मृतदेहांची अवस्था इतकी छिन्नविच्छिन्न झाली होती की, सुरुवातीला त्यांची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. या घटनेत क्रूझर चालक नागनाथ होलीकट्टे हा देखील जखमी झाला आहे. या अपघातात आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एका अल्पवयीन मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने सोलापूर येथील सीएनएस (CNS) हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. इतर जखमींवर मंगळवेढा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर या मार्गावर सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून आणि प्रयत्नांची पराकाष्टा करून वाहतूक पूर्ववत केली.
रायगडमधील महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट यांच्यात झालेल्या राडा प्रकरणी जामीन मंजूर होताच मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तातडीने कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात करत त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला असून, एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही, अशा शब्दांत आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला. आपल्या अंगात भरत गोगावले आणि सुषमा गोगावले यांचे रक्त असल्याचे सांगत त्यांनी ही लढाई थांबणार नसल्याचे संकेत दिले असून, या भूमिकेमुळे महाडमधील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. जामीन मिळाल्यानंतर विकास गोगावले यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विरोधकांना थेट इशारा देत आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला आहे. एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही, माझ्या अंगात भरत गोगावले आणि सुषमा गोगावले यांचेच रक्त आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला गेलेले आपल्याला कदापि सहन होत नाही, असे सांगतानाच, न्यायदेवतेचा सन्मान राखण्यासाठीच मी कायदेशीर प्रक्रियेला सामोरे गेलो आणि शरण गेलो, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले. त्यांच्या या रोखठोक विधानामुळे महाडमधील राजकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा सुरू आहे. राडा झाल्यानंतर विकास गोगावले फरार होते महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीनंतर, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले फरार झाले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने महायुती सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र ताशेरे ओढले होते. खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याच मंत्र्यांपुढे हतबल असल्याचे चित्र निर्माण झाल्याची टीका करत न्यायालयाने, गोगावले यांना २४ तासांत हजर करण्याचे आदेश सरकारला दिले होते. न्यायालयाच्या या कडक भूमिकेनंतर आणि प्रशासकीय दबावानंतर विकास गोगावले पोलिसांना शरण आले होते. जामीन मंजूर झाल्यानंतर कारागृहातून बाहेर येताच विकास गोगावले यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही, असे ठाम प्रतिपादन करत त्यांनी आपल्या विरोधकांना थेट इशारा दिला आहे. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्यानंतर आणि कायदेशीर लढाई लढल्यानंतर मिळालेल्या जामिनानंतरही गोगावले यांनी आपली आक्रमक शैली कायम ठेवली आहे. कार्यकर्त्यांच्या हितासाठी आपण कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असे संकेत त्यांनी यातून दिले असून यामुळे महाडमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या एका महिला वन अधिकाऱ्याने संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात? असा थेट सवाल करत महाजन यांना जाहीरपणे टोकल्याने सोहळ्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाजन यांच्यावर 'ॲट्रॉसिटी' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची आक्रमक मागणी केल्याने हे प्रकरण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. त्यात आता गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एवढा गदारोळ कशासाठी? गिरीश महाजन म्हणाले, आज घडलेल्या प्रकारामुळे मला खूप वाईट वाटले आहे. मी गेल्या 40 वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहे, पण आजवर कधीहीह असा प्रसंग आला नाही. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलो असलो तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मी कायम आदरच केला आहे. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा मोठा पुतळा आम्हीच उभा केलाय. भाषणात नाव घेण्याचे अनावधानाने राहिले असेल, पण त्यावरून एवढा गदारोळ कशासाठी? मी याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणतायत, पण कशासाठी? प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ॲट्रॉसिटीच्या मागणीवर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणतायत, पण कशासाठी? समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. मी मातंग समाज असो वा वाल्मीक समाज, त्यांच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी होतो. लग्नात जातो, दलित वस्तीत पंगती देतो आणि स्वतः त्यांच्यासोबत जेवायला बसतो. माझ्या 40 वर्षांच्या राजकीय प्रवासात मी निळा शर्ट घातला नाही किंवा समाजाचा सन्मान केला नाही, असे कधीच घडले नाही. तसेच अधिकारी माधवी जाधव यांच्याविषयी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, मला माहित नाही त्या भगिनी कोण आहेत. भुसावळमध्येही विकासकामांसाठी मी कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जामनेरमध्ये सर्व नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य निवडून येतात, यात सर्व समाजाचा वाटा आहे. आम्ही शाम बडोदे यांना जळगावातून तिकीट दिले, हे आमचे सर्वसमावेशक राजकारण असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा गिरीश महाजनांना बाबासाहेबांचे नाव न घेणे भोवणार:आंबेडकरांची अॅट्रोसिटी दाखल करण्याची मागणी; महिला अधिकाऱ्याशी संवाद वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याप्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गिरीश महाजन यांचे कृत्य अॅॅट्रोसिटीचा गुन्हा आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः यासंबंधीचा कायदेशीर ड्राफ्ट तयार करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडेन, असे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे येथील एका शेतात सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर धडक कारवाई करत तो उध्वस्त केला आहे. संशयित आरोपी राजू टिळेकर याच्या मालकीच्या गट क्र. 122 (2) मधील पत्र्याच्या शेडमध्ये हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू होता, जिथून पोलिसांनी वाहनासह तब्बल दीड कोटी रुपयांची बनावट देशी दारू आणि रसायनांचा साठा जप्त केला आहे. या ठिकाणी रॉकेट संत्रा, प्रवरा, भिंगरी, कोंकण प्रिमियम आणि टँगो पंच यांसारख्या नामांकित ब्रँड्सच्या नावाने बनावट मद्य तयार करण्याचे साहित्यही मोठ्या प्रमाणावर आढळले असून, या कारवाईमुळे जिल्ह्यातील बनावट दारू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 24 जानेवारी रोजी मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी गस्तीवर असलेल्या वळसंग पोलिस ठाण्याचे एपीआय राहुल डोंगरे यांच्या सतर्कतेमुळे हा बनावट दारूचा कारखाना उघडकीस आला. मद्रे ते आहेरवाडी रस्त्याने पेट्रोलिंग करत असताना त्यांना राजू टिळेकर यांच्या बांधकामाधीन क्षेत्राजवळ एक 'आयशर' टेम्पो संशयास्पद स्थितीत उभी असलेली दिसली. पोलिसांना या टेम्पोच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांनी तात्काळ तिथे धाव घेत तपासणी केली आणि त्यातून या दीड कोटींच्या बनावट दारू साठ्याचा पर्दाफाश झाला. पोलिसांना पाहताच आरोपींनी काढला पळ पोलिसांना पाहताच टेम्पोजवळ असलेले 3 ते 4 संशयित इसम तिथून पळून गेले, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर त्या ठिकाणच्या पत्र्याच्या गोदामाची झडती घेतली असता, तिथे कोणत्याही परवान्याशिवाय मोठ्या प्रमाणावर बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. या कारवाईमुळे या निर्जन स्थळी दडून सुरू असलेल्या एका मोठ्या बेकायदेशीर उद्योगाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 1 कोटी 54 लाख 9 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त वळसंग पोलिसांनी या प्रकरणी मद्रे येथील राजु उर्फ राजकुमार चंद्रकांत टिळेकर आणि धुळ्यातील दिनू शेठ उर्फ भूषण पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळावरून एकूण 1 कोटी 54 लाख 9 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला आयशर टेम्पो, दारू बनवण्याची 4 स्वयंचलित मशिने, कच्च्या रसायनाचे 122 बॅरल (प्रत्येकी 250 लिटर), रिकाम्या बाटल्या, झाकणे आणि विविध कंपन्यांचे बनावट लेबल्स हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे, टॅगो पंच, रॉकेट आणि कोंकण प्रिमियम यांसारख्या नामांकित ब्रँड्सचे सुमारे 1400 तयार बॉक्सही जप्त करण्यात आले असून, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी या अवैध कारखान्याचा पर्दाफाश केल्याने बनावट दारू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तसेच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
संपूर्ण देशभर 77 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना, गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बिनागुंडा या अतिदुर्गम भागात आज एक ऐतिहासिक सुवर्णक्षण साजरा झाला. एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अधिकृतपणे तिरंगा फडकवण्यात आला. 26 जानेवारी 1950 पासून देशात संविधानाची अंमलबजावणी सुरू होऊन जनतेचे राज्य आले असले, तरी या दुर्गम भागातील आजच्या पहिल्या ध्वजारोहणामुळे हा परिसर आता खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील झाल्याचे दिसत असून, नक्षलवादाच्या छायेतून बाहेर पडणाऱ्या ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गडचिरोली पोलिस दलाने माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात दोन दिवसांपूर्वीच नवीन पोलिस ठाणे उभारून दशकानुदशके चाललेली नक्षलवाद्यांची दहशत मोडीत काढली आहे. घनदाट जंगले आणि डोंगराळ भागामुळे दुर्गम असलेल्या अबुजमाड परिसरातील बिनागुंडा येथे माओवाद्यांच्या अस्तित्वाचे आणि दहशतीचे प्रतीक असलेले त्यांचे स्मारक पोलिसांनी पूर्णपणे नष्ट केले. या धाडसी कारवाईमुळे ग्रामस्थांच्या मनातील मानसिक भीती दूर झाली असून, या भागात प्रथमच लोकशाहीचे प्रतीक असलेला तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक दिवशी केवळ बिनागुंडाच नव्हे, तर सीमेवरील कवंडे, तूमरकोटी आणि फुलणार या अतिदुर्गम गावांतही सुरक्षा दलांच्या उपस्थितीत प्रथमच राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. या सोहळ्यात सुरक्षा जवानांसोबत स्थानिक शाळकरी मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. चिमुकल्यांनी दिलेली भाषणे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून, या भागात आता नक्षलवादाच्या छायेतून बाहेर पडून विकासाची आणि शिक्षणाची नवी पहाट उगवत असल्याचे आशादायी चित्र पाहायला मिळाले.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सर्वच प्रमुख पक्षांचे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रचारासाठी सक्रिय होणार आहेत. फडणवीस यांच्या प्रचार दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून आगामी काळात या निवडणुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. महानगरपालिका निवडणुकीतील यशानंतर आता जिल्हा परिषदांवरही भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली असून, 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या सात दिवसांच्या काळात ते राज्याचा झंझावाती दौरा करणार आहेत. या मोहिमेत फडणवीस 12 जिल्ह्यांमध्ये एकूण 22 जाहीर सभा घेणार असून, दौऱ्याची सुरुवात 28 जानेवारीला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या कोकणातील जिल्ह्यांतून होणार आहे. पक्षाची ताकद ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतः फडणवीस मैदानात उतरल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळाले असून, आगामी निवडणुकीत सर्व जिल्हा परिषदा काबीज करण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा धुराळा शांत होत असतानाच आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सध्या राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित असून, अनेक ठिकाणी प्रशासकांचा कारभार सुरू आहे. मात्र, 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाचा परिणाम या निवडणुकीवर झाला आहे. त्यामुळे आता सरसकट सर्वच नव्हे, तर केवळ 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठीच प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, या जागांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडेल. या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असून, 13 जानेवारीपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिकांनंतर आता ग्रामीण भागातील ही मिनी विधानसभा काबीज करण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपले आराखडे तयार करण्यास सुरुवात केल्याने या रणधुमाळीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
देशभरात 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नाशिकच्या मालेगावात एका दुर्दैवी घटनेने या आनंदावर विरजण पडले आहे. येथील पोलिस परेड मैदानापासून अवघ्या 250 मीटर अंतरावर एका फुगे विक्रेत्याच्या नायट्रोजन गॅस सिलिंडरचा अचानक भीषण स्फोट झाला. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आणि प्रशासनाची एकच धावपळ झाली. या भीषण स्फोटात 5 जण गंभीर जखमी झाले असून, त्यामध्ये दोन लहान मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले आहे, तर इतरांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, या अपघाताचा सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे. मालेगावात 77 व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलिस परेड मैदानावर सुरू असतानाच, मैदानाबाहेर असलेल्या एका फुगे विक्रेत्याच्या नायट्रोजन गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यावेळी मैदानावर अतिरिक्त जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती, तर बाहेर काही नागरिक आपल्या मुलांसाठी फुगे विकत घेण्यासाठी विक्रेत्याभोवती जमा झाले होते. या अचानक झालेल्या भीषण स्फोटात विनोद थोरात, मोहित जाधव, अतुल शेवाळे, प्रमिला यादव आणि उज्ज्वला महाजन हे पाच जण जखमी झाले असून, ध्वजारोहणाच्या उत्साही वातावरणात या दुर्दैवी घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की त्याचा आवाज दूरवर ऐकू गेला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकाएकी खळबळ उडाली. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा सुरू असतानाच हा मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. परिणामी, हा एखादा दहशतवादी हल्ला किंवा घातपात असावा अशा चर्चा आणि अफवांना उधाण आले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असतानाच राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर-मनमाड महामार्गावर आज रक्ताचे सडे पडले. महामार्गाच्या कामातील संथ गती, रस्त्यावर पसरलेली खडी आणि अवजड वाहतुकीमुळे एकाच दिवशी दोन अपघात झाले. यात लोणी येथे बी.एस्सी. ॲग्रीचे शिक्षण घेणाऱ्या संकेत सखाराम बाचकर (वय १८, रा. गौटुंबा आखाडा) या हुशार तरुणाचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत. पहिला अपघात: गाडगे आश्रम शाळेसमोर काळाचा घाला गोटुंबा आखाडा येथील संकेत बाचकर आणि त्याचा मित्र श्रीकांत काशिनाथ हापसे (वय २१) हे दोघे राहुरी कॉलेज येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाहून परतत होते. नगर-मनमाड महामार्गावरील गाडगे आश्रम शाळेसमोर रस्त्याचे काम सुरू असल्याने खडी टाकलेली आहे. ही खडी वाचवण्याच्या प्रयत्नात जड वाहने धोकादायक पद्धतीने चालवली जात आहेत. सकाळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (क्रमांक TN 29 BZ 3381) संकेतच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत संकेत ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर श्रीकांत हापसे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. मयत संकेत हा शांत व प्रेमळ स्वभावाचा होता. त्याचे वडील स्कूल बसवर चालक म्हणून काम करतात. मुलाच्या निधनाने बाचकर कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. दुसरा अपघात: बस स्थानकासमोर थरार पहिली घटना ताजी असतानाच काही मिनिटांत राहुरी बस स्थानकासमोर दुसरा अपघात घडला. रस्त्यावरील खडीवरून दुचाकी घसरल्याने कानडगाव येथील प्रसाद शरद गागरे (वय १८) आणि सार्थक कैलास आहेर (वय १९) या दोन तरुणांना आयशर टेम्पोने उडवले. या अपघातात प्रसाद गागरे याचा हाताचा पंजा पूर्णपणे ठेचला गेला असून पायालाही गंभीर दुखापत झाली आहे, तर सार्थक आहेर हा किरकोळ जखमी झाला आहे. प्रशासकीय 'खुना'चा आरोप! या दोन्ही अपघातांना सर्वस्वी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रकल्प संचालक आणि संबंधित भारत कन्स्ट्रक्शन कंपनी जबाबदार असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. रस्ता दुरुस्त कृती समितीने वारंवार मागणी करूनही या महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली नाही. गेल्या तीन महिन्यांपासून कामाचा वेग संथ असून, सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता रस्त्यावर खडी टाकली जात असल्याने दुचाकीस्वार मृत्यूच्या दाढेत ढकलले जात आहेत. आंदोलनाचा पवित्रा प्रजासत्ताक दिनीच एका निष्पाप विद्यार्थ्याचा बळी गेल्याने आणि तिघे जखमी झाल्याने राहुरी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, अन्यथा येणाऱ्या काळात मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा राहुरीतील नागरिकांनी आणि कृती समितीने दिला आहे.
सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे सोमवारी दि.२६ स्वच्छतागृहाचे बांधकाम करताना मंदिरासारखी कळसाकृती रचना असणारे भुयार सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या विटा व दगडाचे बांध काम असलेले हे भुयार नेमके कशाचे आहे याचा उलगडा मात्र गावातील जुने जाणकार व जेष्ठान्नाही करता आलेला नाही. या ऐतिहासिक पुरातन वास्तू शोधामुळे परिसरात कुतूहल निर्माण झाले असून, याठिकाणी सकाळ पासून बघ्यांची गर्दी जमली आहे. साधारण ८०० स्केअर मिटर मोठे घुमटाकार छप्पर असलेले हे बांधकाम आहे. महसूल प्रशासनातर्फे मंडळ अधिकारी, पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या समक्ष पंचनामा करून तहसीलदार यांच्यामार्फत पुरातत्व विभागाला ही माहिती देण्यात आली आहे. येथिल जैन समाज मंदिर परिसरात वास्तव्यास असणारे अशोक भगवान वाघ यांनी नुकतेच नवीन घराचे बांधकाम सुरु केले आहे. त्याशेजारी रिकाम्या जागेत स्वच्छतागृहासाठी खोदकाम करताना पोकळ जागा सापडली. नेमका हा प्रकार काय? म्हणून संपूर्ण भाग खोदून मोकळा केला, त्यावेळी जुने बांधकाम केलेले घुमटाकार भुयार आढळून आहे. याची रचना गोलाकार असून, दोन्ही बाजूच्या भिंतीला दिवे लावण्यासाठीची जागा सोड लेली आहे. याठिकाणी साधू संत किंवा महान तपस्वी वास्तव्यास असेल अशी चर्चा गांवात रंगू लागली आहे. घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी विजय शेळके,ग्राम विकास अधिकारी आर.जी.गंगावने,प्रतीक जोशी,सुनील वाघ, नदीम शेख यांनीं ग्रामस्थ समक्ष पंचनामा करून घटनेचे स्वरूप स्पष्ट न झाल्याने व कोणत्याही धर्माच्या भावना दुखवील्या जाऊ नये या उद्देशाने पुढील काम बंद करण्यात आले आहे.
अकोला महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या 30 जानेवारीला होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची बनली असून सत्तासंघर्ष तीव्र झाल्याचे चित्र आहे. भाजपकडून शहर सुधार आघाडी स्थापन करत महापौर पदासाठी शारदा खेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासोबत डमी उमेदवार म्हणून कल्पना गोटफोडे यांचा अर्ज सादर करण्यात आला आहे. उपमहापौर पदासाठी भाजपकडून अनिल गोगे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सुरेखा मंगेश काळे यांनी महापौर पदासाठी, तर काँग्रेसकडून आझाद खान अलीयार खान यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये थेट लढत निर्माण झाली आहे. तसच उपमहापौरपदासाठी भाजपचे अमोल मोहोकार यांनीही अर्ज दाखल केला आहे. महापौर पदासाठी 3 उमेदवारांनी एकूण 5 अर्ज दाखल केले. तर उपमहापौर पदासाठी 4 उमेदवारांनी 5 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. अपक्ष उमेदवारामुळे राजकीय गणितच बदलली या निवडणुकीत भाजपचे माजी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचे पुतणे भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यांनी उपमहापौर पदासाठीही अर्ज दाखल केल्याने चुरस अधिक वाढली आहे. विशेष म्हणजे, उपमहापौर पदासाठी दाखल केलेल्या त्यांच्या अर्जाचे सूचक व अनुमोदक हे ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. यामुळे भाजपविरोधी आघाडीत रणनीती आखली जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सध्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीही 3 असे एकूण 6 उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे. अकोल्याच्या महापालिकेत 41 च्या बहुमतावर सर्वांचं लक्ष अकोला महानगरपालिकेत बहुमतासाठी आवश्यक असलेला 41 नगरसेवकांचा जादुई आकडा कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे संपूर्ण अकोल्याचे लक्ष लागले आहे. भाजपप्रणीत आघाडी आणि भाजपविरोधी पक्षांनी एकत्र बांधलेली एकजूट यांच्यात थेट सामना होत आहे. अपक्ष उमेदवाराची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता असून, तो उबाठासोबत गेला तर काँग्रेस आपला उमेदवार माघार घेणार का की अपक्ष उमेदवारच शेवटच्या क्षणी माघार घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. येत्या 30 जानेवारीला महापौर निवडीसाठी होणाऱ्या विशेष सभेत महापालिकेतील सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे.
कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेला मृत्यू पोलिस चौकशीच्या तणावातून झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, माजी नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे बेपत्ता असल्याची तक्रार ठाकरे गटानेच कोळशेवाडी पोलिस ठाण्यात दिली होती व तसे पोस्टर्सही शहरात लावले होते. मात्र मधुर म्हात्रे यांनी स्वतः समोर येत हे पोस्टर लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात पोलिसांनी रमेश तिखे यांना चौकशीसाठी फोन करून बोलावल्याने त्यांना धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात असून, यावरून स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिस तपासाच्या नावाखाली वारंवार फोन करून कार्यकर्त्यांना घाबरवण्याचा व मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत होते, असा दावा केला जात आहे. या सततच्या पोलिस कारवाईच्या धास्तीमुळेच तिखे यांचा मृत्यू झाल्याचे सांगत, ठाकरे गटाने या प्रकरणाला उमेश म्हात्रे आणि पोलिस प्रशासनाला जबाबदार धरले असून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय? कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे बेपत्ता असल्याची तक्रार खुद्द ठाकरे गटानेच कोळशेवाडी पोलिस ठाण्यात दिली होती. या तक्रारीनंतर हे दोन्ही नगरसेवक नक्की गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी आणि या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन शहरात विविध ठिकाणी हे नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावले होते. या पोस्टरवर नगरसेवक कुठे आढळल्यास ठाकरे गटाच्या शाखेला संपर्क साधावा, असा मजकूरही प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र, या पोस्टरबाजीमुळे नगरसेवकांची नाहक बदनामी होत असल्याचा दावा त्यांचे नातेवाईक दिव्येश म्हात्रे यांनी केला. याप्रकरणी म्हात्रे यांनी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात ठाकरे गटाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आणि पोस्टर लावण्यात सहभागी असलेल्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांना चौकशीला बोलावण्याचे सत्र सुरू केले. पोलिसांकडून वारंवार येणारे फोन आणि चौकशीचा दबाव यामुळे कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच प्रकरणाचा पाठपुरावा सुरू असताना, कल्याण पूर्वेतील करपेवाडी परिसरात राहणारे आणि या पोस्टर मोहिमेत सक्रिय असलेले ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांचा आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. पोलिसांकडून चौकशीसाठी वारंवार येणारे फोन आणि त्यातून निर्माण झालेला मानसिक ताण व दबाव यामुळेच तिखे यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा जीव गेला, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेमुळे स्थानिक राजकारण चांगलेच तापले असून पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याप्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गिरीश महाजन यांचे कृत्य अॅॅट्रोसिटीचा गुन्हा आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः यासंबंधीचा कायदेशीर ड्राफ्ट तयार करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडेन, असे त्यांनी म्हटले आहे. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. भारताने 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंगीकृत केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या संविधानाचे शिल्पकार मानले जातात. त्यामुळे साहजिकच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्याचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. पण गिरीश महाजन यांनी आपल्या संपूर्ण भाषणात एकदाही बाबासाहेबांचे नाव घेतले नाही. ते विसरले की त्यांनी ते जाणिवपूर्वक टाळले हे स्पष्ट झाले नाही. पण माधवी जाधव नामक पोलिस अधिकाऱ्याने या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी या प्रकरणी तीव्र रोष व्यक्त महाजनांना जाब विचारला. आंबेडकरांचा माधवी जाधवांशी फोनवरून संवाद प्रकाश आंबेडकरांनी या महिला अधिकाऱ्याशी फोनवरून संवाद साधला. त्यात त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर अॅॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, आज नाशिकमध्ये भाजप मंत्री गिरीश महाजनच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव (वनरक्षक) महिलेसोबत फोनवर बोललो. यावेळी माधवी जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला सांगितला. मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्य अट्रोसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल. आरएसएस-भाजपाकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय. भाजप आणि गिरीश महाजनच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे आंबेडकर म्हणाले. रोहित पवारांनी व्यक्त केला संताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, प्रजासत्ताक दिनीच बाबासाहेबांच्या नावाचा विसर मंत्र्यांना पडत असेल तर याहून मोठे दुर्देव काय असू शकते ? भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अमुल्य असून एखाद्या मंत्र्याच्या भाषणातील अनुल्लेखाने बाबासाहेबांचे योगदान पुसता येणारे नाही. असो नाशिकमध्ये घडलेली घटना नकळत झाल्याचे मान्य करत मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी अशा चुका होणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे. संबंधित महिला अधिकारी यांनी व्यक्त केलेली भावना अतिशय योग्य आणि भारतीय प्रजासत्ताकाविषयी प्रेम दर्शवणारी असून त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठलीही कारवाई होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी! गिरीश महाजनांवर संतापून काय म्हणाल्या होत्या माधवी जाधव? माधवी जाधव म्हणाल्या, गिरीश महाजनांनी आपल्या भाषणात कुठेही बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले नाही. जी व्यक्ती संविधानाला कारणीभूत आहे. त्याला तुम्ही संपवायला निघालात? पालकमंत्र्यांची ही फार मोठी चूक आहे. त्यांनी आपली चूक मान्य केली पाहिजे. मला मीडियाशी देणे घेणे नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन, माती काम करेन. पण मी बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला निलंबित करायचे असेल तर खुशाल करा. पण बाबासाहेबांना संपवण्याचे काम मी करू देणार नाही. यावेळी अन्य एक महिला पोलिस अधिकारी माधवी जाधव यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यावेळी माधवी त्यांना म्हणाल्या, मॅडम तुम्ही देखील संविधानामुळे आहात. पालकमंत्रीही संविधानामुळे आहेत. बाबासाहेबांचे नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचे नाव एकदाही भाषणात आले नाही. लोकशाही व संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावे वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा व प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचे नाव भाषणात का आले नाही? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत संविधानाची हत्या करण्यासाठी कोश्यारींना पद्मभूषण दिला काय? असा प्रश्न केला होता. कोश्यारी यांनी सोमवारी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली. मी संघ स्वयंसेवक आहे. मी भारतमातेचे काम करतो. हे काम करताना कुणाला वाईट वाटत असेल तर मी काय करणार? असे ते म्हणालेत. भगतसिंह कोश्यारी हे 2019 ते 2023 या कालावधीत महाराष्ट्राचे राज्यपाल होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधान केले होते. यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. एवढेच नाही तर उद्धव ठाकरे सरकार उलथावून लावण्यातही त्यांचे काही निर्णय कारणीभूत ठरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. त्यामुळे त्यांना पद्मभूषण जाहीर करण्यात आल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी यांनी उपरोक्त सवाल केला आहे. काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी? भगतसिंह कोश्यारी यांनी आज वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, मी टीव्ही पाहत नाही व रेडिओही ऐकत नाही. लोकांचे मला अभिनंदाचे फोन आले. एका सामान्य कार्यकर्त्याला पद्मभूषण पुरस्कार दिल्याबद्दल मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान मोदी यांचा आभारी आहे. मला विश्वास आहे की, आता आमचे संघ कार्यकर्ते समाजासाठी आणखी निस्वार्थपणे काम करतील. मी हा पुरस्कार संघ व त्याच्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो. ते पुढे म्हणाले, सामान्यतः एखाद्याला असा पुरस्कार मिळतो तेव्हा तो कुणालातरी समर्पित करण्याची इच्छा व्यक्त केली जाते. आज मी जो काही आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ स्वयंसेवकांच्या प्रेमामुळेच आहे. मी म्हणेन की, हा सन्मान आपल्या प्रिय लोकांसाठी आहे. माझी कुणी प्रशंसा करावी किंवा निंदा करावी म्हणून मी काम करत नाही. मी संघाचा स्वयंसेवक आहे. भारतमाता माझ्यासाठी सर्वकाही आहे. त्यासाठी मी काम करत असतो आणि काम करत राहणार. हे काम करताना कुणाला वाईट वाटत असेल तर त्याला मी काय करणार? काय म्हणाले होते संजय राऊत? भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण दिल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. ते म्हणाले होते, महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपाचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून मविआचे सरकार उखडून टाकले. त्यांच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले होते. हा पुरस्कार संविधानाची हत्या करण्यासाठी दिला आहे का? असा प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला होता.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील पक्षाच्या बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडल आहे. कोळसेवाडी पोलिसांकडून फोनवरून वारंवार दबाव येत असल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, रमेश तिखे असे ठाकरे गटाच्या मृत पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांनी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात ठाकरे गटाच्या बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावले होते. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांकडून वारंवार रमेश तिखे यांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात येत होते. यामुळे ते तणावात गेले होते. त्यांना अस्वस्थ वाटत होते. या मानसिक दबावातूनच त्यांची प्राणज्योत मालवली, असा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी केला. या घटनेनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. विरोधकांनी या घटनेच्या निष्पक्ष चौकशीहीची मागणी केली आहे. रमेश तिखे हे पक्षाचे सक्रिय व आक्रमक कार्यकर्ते होते. त्यांच्या मृत्यूमुळे ठाकरे गटात शोककळा पसरली आहे. नेमके काय आहे प्रकरण? कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे व कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार ठाकरे गटाने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असताना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे नगरसेवक बेपत्ता झाल्याचे पोस्टर शहरात चिटकवले होते. या प्रकरणी मधुर म्हात्रे यांच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिस ठाकरे गटांच्या पदाधिकाऱ्यांवर चौकशीसाठी येण्यासाठी दबाव टाकत होते. या दबावामुळेच रमेश तिखे यांची तब्येत बिघडली आणि आज पहाटे हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी फेटाळले आरोप दुसरीकडे, पोलिसांनी ठाकरे गटाचे आरोप फेटाळलेत. तसेच या प्रकरणाची चौकशी कायद्याच्या चौकटीतच करण्याची ग्वाही दिली आहे. सध्या रमेश तिखे यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास केला जात आहे. पण खरे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
राज्याचे वनमंत्री तथा भाजप नेते गणेश नाईक यांनी भाजपने परवानगी दिल्यास सत्ताधारी शिवसेनेचे नामोनिशान मिटवून टाकण्याची वल्गना केली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. गणेश नाईक यांचे थोडे जास्तच होत आहे. ते साफ करण्याची धमकी कुणाला देतात? तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यामुळेच सत्तेत आलात हे विसरू नका, असे त्यांनी म्हटले आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीवेळी मुंबईत गणेश नाईक व शिंदे गटात मोठा राजकीय कलगीतुरा रंगला होता. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हा कलगीतुरा संपण्याची शक्यता होती. पण आता भाजप नेते तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा भाजपने परवानगी दिली तर शिंदे गटाचे नामोनिशान मिटवण्याचे विधान केल्यामुळे हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्र्यांकडून काय आदेश घ्यायचे ते घ्या मंत्री संजय शिरसाट त्यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेताना म्हणाले, गणेश नाईक यांचे थोडे जास्तच होत आहे. ते दरवेळी आव्हानाची भाषा करतात. त्यांनी आपले डोके ठिकाण्यावर ठेवले पाहिजे. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांमुळेच सत्तेत आलात याचा विसर पडू देऊ नका. साफ करण्याची भाषा कुणाला करत आहात? साफ करायला हे काय नवी मुंबईचे डोंगर आहेत का? की तेथील रेतीच्या खदानी आहेत? आम्ही हिंमतीने व जिद्दीने उभे राहणारे लोक आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तुम्हाला काय आदेश घ्यायचे ते घ्या. पण आम्हाला कमी समजण्याची चूक करू नका. आम्ही ऐकूण घेतो याचा अर्थ असा होत नाही की, आम्हाला काही कळत नाही. महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा आणि तु्म्ही बोलायचे हे यापुढे सहन केले जाणार नाही, असे शिरसाट म्हणाले. शिंदेंना हलक्यात घेण्याची चूक करू नका ते पुढे म्हणाले, मी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. गणेश नाईकांचे हे नेहमीचच झाले आहे. आम्ही साफ करून टाकू, उखडून टाकू, फेकून देऊ. ते कुणासाठी ही भाषा वापरत आहेत. आम्ही जो काही त्याग केला, त्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही एकनाथ शिंदेंना हलक्यात घेण्याची चूक करू नका. तुमची एवढीच ताकद असेल तर देवेंद्र फडणवीस यांना सांगा व काय निर्णय घ्यायचाय तो घेऊन टाका. आम्हीही अशीच भाषा केली तर महायुतीत मिठाचा खडा पडेल. त्यामुळे एखाद्या नेत्याबद्दल बोलताना थोडेसे भान राखायला हवे. एकनाथ शिंदे जे काही निर्णय घेतात ते शांतपणे व संयमाने घेतात. महायुतीत बिघाड होऊ नये म्हणून आम्ही आज बोलत नाही. पण महायुतीत बिघाड व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर आव्हान देत बसा. आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहोत, असेही संजय शिरसाट यावेळी गणेश नाईक यांना ठणकावत म्हणाले. आत्ता पाहू काय म्हणाले होते गणेश नाईक? वनमंत्री गणेश नाईक आज सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, भाजपने परवानगी दिली तर मी यांचे नामोनिशाण मिटवून टाकेन. मी आज हे पुन्हा बोलत आहे. भाजप हा शिस्त पाळणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाने आदेश दिला म्हणून मी ते मान्य केले. मनाला पटले नसले तरी कार्यकर्त्यांनी ते शांतपणे सहन केले. पक्ष नेतृत्वाचा निर्णय आम्ही मान्य केला. एकेकाळी मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) महायुतीमधील सर्व कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे लढू द्यावे. निवडणुकीनंतर ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून येतील त्यांना मित्र पक्षांनी पाठिंबा द्यावा व उर्वरित पदांची वाटणी करावी असे माझे मत होते. मी ही बाब मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घातली होती. त्यांनी त्यावर होकार दिला नाही आणि नकारही दिला नाही. आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा आम्हाला होती. पण काही ठिकाणी ती संधी मिळालीच नाही, असे ते म्हणाले.
राजस्थानमध्ये सरपंच प्रशासक:महाराष्ट्रात अधिकाऱ्यांची नेमणूक; असे का? सरपंच संघटनांचा सवाल
राजस्थान सरकारने ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याउलट, महाराष्ट्र सरकार मात्र लोकनियुक्त सरपंचांना डावलून शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याच्या दिशेने जात असल्याचा आरोप सरपंच संघटनांनी केला आहे. राजस्थानच्या ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाने १६ जानेवारी २०२५ रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ ३१ जानेवारी २०२५ पर्यंत संपत आहे आणि अपरिहार्य कारणांमुळे निवडणुका होऊ शकत नाहीत, त्या ग्रामपंचायतींमध्ये निवर्तमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त केले जाईल. तसेच, उपसरपंच व वार्डपंचांचा समावेश असलेली प्रशासकीय समिती स्थापन करून गावाचा कारभार लोकप्रतिनिधींच्याच मार्गदर्शनाखाली सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याउलट, महाराष्ट्रात १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत संपुष्टात येणाऱ्या ग्रामपंचायतींवर सरपंचांना डावलून ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि विस्तार अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नेमले जाणार आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात अशा ५५० ग्रामपंचायती आहेत. शासनाच्या या ताज्या निर्णयामुळे लोकशाही धोक्यात आली असून, ग्रामस्वराज्य आणि ग्रामीण विकासावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके आणि प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “राजस्थान सरकार लोकनियुक्त सरपंचांवर विश्वास ठेवते, मग महाराष्ट्र सरकारला लोकप्रतिनिधींवर विश्वास का नाही? हा लोकशाहीविरोधी आणि ग्रामस्वराज्याला कमजोर करणारा निर्णय आहे,” असे त्यांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते, राजस्थान सरकारचा निर्णय लोकशाही, विकेंद्रीकरण आणि ग्रामस्वराज्य मजबूत करणारा आहे. तो महाराष्ट्रासाठीही आदर्श ठरू शकतो. लोकनियुक्त सरपंचांना डावलून प्रशासक बसवल्यास मुख्यमंत्री ग्राम समृद्धी व तत्सम महत्त्वाकांक्षी योजना केवळ कागदावरच राहतील आणि गावांचा सर्वांगीण विकास खुंटेल. गावाच्या वास्तवाशी नाते नसलेल्या अधिकाऱ्यांकडे कारभार दिल्यास ग्रामीण विकासाची गती मंदावते, तर लोकनियुक्त प्रतिनिधींना जबाबदारी दिल्यास विकासकामे आणि योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होते. सरपंच संघटनेने महाराष्ट्र सरकारकडे राजस्थानप्रमाणेच धोरण स्वीकारण्याची ठाम मागणी केली आहे. जर लोकनियुक्त सरपंचांना प्रशासक म्हणून मान्यता दिली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. “राजस्थानमध्ये जे शक्य आहे, ते महाराष्ट्रात अशक्य का? लोकशाहीचा मान राखा, ग्रामस्वराज्य वाचवा,” अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
नांदगाव पेठ येथील 'क' श्रेणी तीर्थस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री गोविंद प्रभू तीर्थस्थानाचा दोन दिवसीय वार्षिक उत्सव आजपासून (सोमवार, २६ जानेवारी) सुरू होत आहे. या उत्सवाची सुरुवात श्री प्रभूंच्या पालखी मिरवणुकीने होणार असून, संपूर्ण जिल्ह्यातील महानुभाव पंथीय भक्त-भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सोमवारी दुपारी ४ वाजता श्री प्रभूंची पालखी मिरवणूक काढण्यात येईल. श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ, यावली शहीद यांचे भजन, ढोल-ताशे, बँड, लेझीम पथक, रथ आणि विविध वाद्यांच्या गजरात ही पालखी गावातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करेल. या मिरवणुकीत शेकडो बालगोपाल, युवक-युवती, महिला मंडळे आणि भक्त-भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी होतील. गणराज्य दिनाच्या संध्याकाळी निघणाऱ्या या शोभायात्रेत देशभक्ती आणि देवभक्तीचा अनोखा संगम अनुभवण्यास मिळेल, ज्यामुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघेल. पालखी मिरवणूक गावातील मुख्य चौकात पोहोचल्यानंतर प्रतिष्ठित व मान्यवर व्यक्तींच्या हस्ते श्री प्रभूंच्या पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे. पालखी मिरवणुकीनंतर विविध धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन आणि दर्शन सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या वार्षिकोत्सवात सहभागी होऊन श्री गोविंद प्रभूंचे दर्शन व कृपाशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन तीर्थस्थान ट्रस्ट व आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. वार्षिकोत्सवाच्या तयारीला अंतिम स्वरूप प्राप्त झाले असून, प.पू. प.म. श्री. दर्यापूरकर मोठेबाबा यांच्या पावन मार्गदर्शनाखाली तीर्थस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनय मुनी तसेच सर्व संचालक मंडळ, सेवेकरी व ग्रामस्थ उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून भातकुली येथे स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे अमरावती आणि भातकुली या दोन्ही बाजार समित्यांवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांना पुढील आदेशापर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यास मनाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवार, २८ जानेवारी रोजी होणार आहे. येथील जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी दोन दिवसांपूर्वी बाजार समितीच्या विभाजनाची अधिसूचना जारी केली होती. या निर्णयामुळे अडीच वर्षांपासून कार्यरत असलेले १७ सदस्यीय संचालक मंडळ आपोआप बरखास्त झाले होते. संचालक मंडळ बरखास्त झाल्यामुळे दोन्ही बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्तीही करण्यात आली होती. या कारवाईविरोधात सभापती हरीश मोरे यांच्यासह संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, याच विषयावर यापूर्वी दाखल असलेल्या दोन याचिकांमध्ये अंतिम आदेश देण्यास मनाई असताना प्रशासकीय ताबा घेणे व कपाटे सील करणे हे प्राथमिकदृष्ट्या न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात आहे. त्यामुळे २८ जानेवारीपर्यंत प्रशासकांना कार्यवाही करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. न्या. श्रीमती एम. एस. जवळकर व न्या. नंदेश देशपांडे यांच्या न्यायपीठासमोर या याचिकेची सुनावणी होईल. या न्यायालयीन आदेशावर प्रतिक्रिया देताना अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे म्हणाले की, हा सत्याचा विजय आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता निवडून आलेल्या संचालक मंडळाला हटवणे हे लोकशाहीविरोधी होते, असेही त्यांनी नमूद केले. न्यायालयाने दिलेली स्थगिती ही शेतकरी, व्यापारी आणि सहकार क्षेत्राच्या हिताची असल्याचे मोरे यांनी सांगितले.
अमरावती महानगरपालिकेच्या आगामी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि युवा स्वाभिमान पार्टी (वायएसपी) यांनी रविवारी अर्ज उचलले. ३० जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी सुट्टी असल्याने, मंगळवारीच उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल. भाजपच्या लता देशमुख यांनी महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांसाठी अर्ज उचलले आहेत. युवा स्वाभिमान पार्टीकडून सचिन भेंडे, अजय जैस्वाल आणि प्रशांत वानखडे या तीन नगरसेवकांनी उपमहापौर पदासाठी अर्ज उचलले आहेत. प्रशांत वानखडे यांनी दोन अर्ज घेतले आहेत. अर्ज उचलण्याची आणि दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी सकाळी ११.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयातून पूर्ण केली जाईल. त्यामुळे या निवडणुकीत किती नगरसेवक प्रत्यक्ष अर्ज दाखल करतात, हे मंगळवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली बैठक शुक्रवार, ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बोलावण्यात आली आहे. या बैठकीत, सुरुवातीच्या १५ मिनिटांत वैध आणि अवैध अर्जांची यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर पुढील १५ मिनिटे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर, सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांना हात उंचावून मतदान करावे लागेल. ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतील, त्याला विजयी घोषित केले जाईल. या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पीठासीन अधिकारी म्हणून निवड केली आहे. उमेदवाराला आपला अर्ज मागे घ्यायचा असल्यास, सूचक किंवा अनुमोदक यापैकी एका नगरसेवकाच्या संमतीने लेखी अर्ज सादर करावा लागेल. एकदा दिलेला अर्ज कोणत्याही परिस्थितीत परत घेता येणार नाही. ही प्रक्रिया ३० जानेवारीच्या बैठकीतील पहिल्या १५ मिनिटांत पूर्ण केली जाईल.
संरक्षण क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेमुळे 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी झाले, असे प्रतिपादन पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) सेवानिवृत्त समूह संचालक काशीनाथ देवधर यांनी केले. ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित एका व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) संयुक्त विद्यमाने डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्र सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. देवधर यांनी 'ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत' या विषयावर मार्गदर्शन केले. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, पुणे येथील माजी प्राचार्य डॉ. नागनाथ धर्माधिकारी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रवींद्र कडू आणि विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. देवधर यांनी १९६५ च्या युद्धाचा संदर्भ देत, त्यावेळी भारताला शस्त्रास्त्रांसाठी परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागले होते, असे सांगितले. देवधर पुढे म्हणाले की, भारताने नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारला आहे, 'युद्ध नको, बुद्ध हवा' हे भारताचे धोरण आहे. मात्र, कोणीही भारताच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. २०१४ नंतर भारताने दहशतवादाविरोधात 'जशास तसे' उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे घेतला. या कारवाईत भारताने पाकिस्तानच्या नागरी वस्त्या किंवा लष्कराला लक्ष्य न करता, केवळ दहशतवादी ठिकाणांना नेस्तनाबूत केले. भारताने पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले. पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर त्यांच्या विनंतीवरून भारताने युद्ध थांबवले, असेही देवधर यांनी स्पष्ट केले. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी आपल्या भाषणात 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेवर भर दिला. भारताला अधिक आयात करावी लागत असल्याने स्वावलंबी होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने दिलेला 'आत्मनिर्भर भारत' हा मंत्र तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी अमर कतोरे याने सादर केलेल्या देशभक्तीपर गीताने झाली, तर मंजरी बहादुरे या विद्यार्थिनीने गायिलेल्या 'वंदे मातरम्' गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
परळी नगरपालिकेतील भ्रष्टाचाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी गत सहा दिवसांपासून नगरपालिका कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या वैजनाथ सुरवसे यांनी प्रजासत्ताकदिनी नगरपालिका इमारतीवरुन आत्महत्येचा प्रयत्न केला. तब्बल दीड तास चाललेला हा हायव्होल्टेज ड्रामा पोलिसांनी सुरवसे यांना ताब्यात घेतल्यानंतर थांबला. परळी नगरपरिषदेत २००१ ते २०२६ या कालावधीत २ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला. हा भ्रष्टाचार करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करुन कारवाई करावी, या मागणीसाठी वैजनाथ सुरवसे मागील 6 दिवसांपासून नगरपालिका कार्यालयापुढे उपोषणाला बसले होते. पण अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर आज प्रजासत्ताकदिनी त्यांनी इमारतीच्या छतावर चढून तेथून उडी मारण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित घटनेमुळे पोलिस अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी सुरवसे यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आपला एक पाय इमारती खाली व एक पाय छतावर ठेवत तेथून उडी मारण्याचा इशारा दिला. यामुळे अधिकाऱ्यांना आहे त्याच ठिकाणी थांबावे लागले. फेसबुक लाईव्ह करत उडी मारण्याचा प्रयत्न या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वतः वैजनाथ सुरवसे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे तो व्हायरल केला आहे. त्यांच्या मते, परळी नगरपालिकेत गत २५ वर्षात भक्ती एंटप्रायजेस या बोगस कंत्राटादाराने २ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला आहे. यामध्ये सहभागी असलेल्या मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, संतोष रोडे, आशिषकुमार अनिलकुमार दीक्षित, बापू नरवडे आणि संबंधीत १५ प्रशासकीय अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी. त्यांना निलंबित करण्यात यावे. या मागणीसाठी त्यांनी मागील २१ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. अधिकारी जवळ जाताच उडी मारण्याचा इशारा सोमवार दि. २६ जानेवारी रोजी नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते ध्वाजारोहण झाल्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास सुरवसे यांनी नगरपालिका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील छतावर चढत फेसबुक लाईव्ह करत उडी मारुन आत्महत्या करण्याचा इशारा दिला. हा प्रकार नगरपालिका प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यास खाली येण्याच्या सुचना केल्या. परंतु कर्मचारी व नागरीक त्याच्या जवळ जाताच तो उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे आत्महत्येचा हा ड्रामा दुपारी दीड वाजेपर्यंत सुरु होता. अखेर पोलिसांनी त्यास पकडून ताब्यात घेतले.
भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या संचलनात आज विविध राज्य व मंत्रालयांच्या चित्ररथांनी भारताचा संपन्न सांस्कृतिक वारसा व विकसित भारताचे दर्शन घडवले. यात महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गणेशोत्सवाच्या संकल्पनेवर आधारित हा चित्ररथ कर्तव्य पथावर येताच गणपती बाप्पा मोरयाचा एकच गजर ऐकू आला. भारताचा 77 व्या प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा नवी दिल्ली या देशाच्या राष्ट्रीय राजधानीतील कर्तव्य पथावर पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी चित्तथरारक कवायतींच्या माध्यमातून आपल्या शौर्याचे प्रदर्शन केले. यावेळी विविध राज्य व मंत्रालयाच्या चित्ररथांनी देशाचा संपन्न सांस्कृतिक वारसा व विकसित भारताचे दर्शन घडवले. यावेळी महाराष्ट्राच्या गणेशोत्सवावर आधारित चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्राने यंदा चित्ररथासाठी राज्यातील प्रमुख उत्सव असलेल्या गणेशोत्सवाचा विषय निवडला होता. संचलनासाठी तयार करण्यात आलेल्या खास चित्ररथात डोक्यावरून नेण्यात येणारी गणेशमूर्ती, गणेशमूर्तीचे रंगकाम करणारा कलाकार, ढोलपथकात ढोल वाजवणारी महिला, अष्टविनायकांच्या प्रतिकृती, गणेश मंदिराची प्रतिकृती असा जिवंत देखावा मांडण्यात आला होता. या चित्ररथासोबत असलेल्या कलाकारांनी उत्कृष्ट नृत्याविष्कार करून हा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दुसरीकडे, कर्तव्य पथावरील संचालनामध्ये देशातील 17 राज्ये व 13 मंत्रालयांचे मिळून एकूण 30 चित्ररथ सहभागी झाले होते. यावेळी तिन्ही सैन्य दलांच्या जवानांनी थरारक प्रात्यक्षिकेही दाखवली. प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा व युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन उपस्थित होत्या. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्यदलांच्या जवानांचे अभिवादन स्वीकारले. तसेच संचलनात सहभागी झालेल्या कलाकारांच्या कलागुणांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख पाहुण्यांना कर्तव्य पथावरील संपूर्ण कार्यक्रमाची व विविध चित्ररथामधून दाखवण्यात आलेल्या भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.
मराठमोळा रील स्टार तथा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचे निधन झाले आहे. त्याच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यासह सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रथमेश गत काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्या मित्राने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या निधनाची दुःखद बातमी सार्वजनिक केली. प्रथमेश कदम व त्याची आई प्रज्ञा कदम यांचे रील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. प्रथमेश कदमचा जवळचा मित्र तथा सोशल मीडिया स्टार तन्मय पाटेकरने त्याच्या निधनाची पुष्टी केली आहे. 'तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश. देवाघरी स्वत:ची काळजी घे रे, खूप आठवण येईल तुझी, मिस यू भाई', अशा शब्दांत तन्मयने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तन्मयने प्रथमेशसोबतचा एक फोटोसुद्धा शेअर केला आहे. तन्मयच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत श्रद्धांजली वाहिली आहे. प्रथमेश कदमच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली होती. त्याने ही जबाबदारी सांभाळलीच, शिवाय या दुःखावर मात करत आपल्या आईलाही धीर दिला. गत अनेक वर्षांपासून तो आपल्या आईसोबत सोशल मीडियावर रील करत होता. त्यांचे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत होते. एवढेच नव्हे तर मराठी कलाकारांनीही या माय-लेकाच्या व्हिडिओला दाद दिली होती. त्यामुळे त्याच्या निधनामुळे सर्वच स्तरावर हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रथमेशने गत महिन्यात एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्याने आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला होता. तसेच आपल्या आजारपणावरही भाष्य केले होते. त्यानंतर तो रुग्णालयात भरती झाला होता. तिथेही त्याने अनेक मजेशीर व्हिडिओ पोस्ट करत लोकांचे मनोरंजन केले होते. नवीन वर्षात त्याचे एक गाणेही प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तोच त्याचा अखेरचा व्हिडिओ ठरला. प्रथमेशच्या व्हिडिओवर नेटकरी कमेंट्स करून त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर आता सर्वांचे लक्ष महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक ३ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची अधिकृत माहिती कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी अनुभवी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ठाणे आणि कल्याणमध्ये महायुतीतील दोन प्रमुख पक्ष असलेल्या शिंदेसेना आणि भाजपमध्येच सत्तेसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. तर कल्याणमध्ये 'नॉट रिचेबल' नाट्यामुळे सस्पेन्स कायम आहे. ठाण्यात SC आणि कल्याणमध्ये ST आरक्षण असल्याने दोन्ही ठिकाणी नवीन चेहरे पाहायला मिळतील. ठाणे महापालिका: 'गड' राखण्यासाठी शिंदेसेना सज्ज ठाणे महापालिकेत शिंदेसेनेचे स्पष्ट वर्चस्व असून ९५ पैकी ७५ नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमतासाठी ६६ आकड्याची गरज असताना शिंदेंकडे पुरेसे संख्याबळ आहे. यंदाचे महापौरपद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने पक्षात अनेक इच्छुक आहेत. पद्मा भगत, वनिता घोगरे, विमल भोईर, डॉ. दर्शना जानकर, आरती गायकवाड हे प्रबळ दावेदान मानले जात आहेत. KDMC: ४ नगरसेवक 'नॉट रिचेबल' असल्याने पेच वाढला केडीएमसीमध्ये महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी राखीव आहे. येथे सत्तास्थापनेसाठी ६२ नगरसेवकांची गरज आहे. शिंदेसेना (५३) आणि भाजप (५०) यांच्यात अटीतटीची लढत असून, उद्धवसेनेचे ४ नगरसेवक 'नॉट रिचेबल' झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हे नगरसेवक शिंदेसेना किंवा मनसेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. केडीएमसीमध्ये उद्धवसेनेने ७ नगरसेवकांच्या स्वतंत्र गटाची नोंदणी केली असली तरी, ४ नगरसेवक गायब असल्याने 'घोडेबाजार' होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापौर आणि उपमहापौर पदासाठी २९ व ३० जानेवारी रोजी अर्ज दाखल करता येतील. मिरा-भाईंदर: भाजपचा विजयरथ सुसाट मिरा-भाईंदरमध्ये भाजपने ९५ पैकी ७८ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे. बंडखोर अनिल भोसले यांनीही भाजपला पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ ७९ वर पोहोचले आहे. येथे महापौर भाजपचाच होणार हे निश्चित आहे. ३० जानेवारीला अर्ज भरले जातील आणि ३ फेब्रुवारीला भाजपचा महापौर-उपमहापौर विराजमान होणे केवळ औपचारिकता उरली आहे. उल्हासनगर आणि भिवंडीत हालचालींना वेग उल्हासनगर येथे भाजप (३७) आणि शिंदेसेना (३६) यांच्यात 'कांटे की टक्कर' आहे. ४० हा मॅजिक फिगर गाठण्यासाठी अपक्षांची भूमिका कळीची ठरेल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येथे निवड होईल. तर भिवंडीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि सपा यांनी मिळून 'भिवंडी सेक्युलर फ्रंट' स्थापन केल्याने त्यांचे पारडे जड दिसत आहे. बहुमतासाठी ४६ ची गरज असताना या आघाडीकडे सध्या ४८ मते आहेत. कशी असणार महापौर-उपमहापौर निवडीची प्रक्रिया? महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, निवडीचा संपूर्ण कार्यक्रम आता निश्चित झाला आहे. या प्रक्रियेनुसार, ३० जानेवारी रोजी महापालिका मुख्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील. हे प्राप्त झालेले सर्व अर्ज ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत पीठासीन अधिकारी कटियार यांच्यासमोर सादर केले जातील. पीठासीन अधिकारी सर्व अर्जांची तांत्रिक छाननी करतील आणि त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी दिला जाईल. या कालावधीनंतर जर केवळ एकच उमेदवार रिंगणात शिल्लक राहिला, तर त्यांची निवड बिनविरोध घोषित केली जाईल; मात्र एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबवली जाईल. महापौरपदाची निवड झाल्यानंतर हीच संपूर्ण पद्धत उपमहापौरपदाच्या निवडीसाठीही अवलंबली जाणार आहे.
पालांदुरचे नागरिक तहानलेलेच:हर घर जल योजना फलकापूरतीच मर्यादीत, यंदा तरी मिळणार का जल जीवनचे पाणी?
लाखनी तालुक्यातील १०४ गावांपैकी ८२ गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे उरकण्यात आली आहेत.अशा ८२ गावांप्रमाणेच पालांदूर या गावातही जलजीवन मिशनचे वास्तव आजही कागदावरच असल्याचे चित्र आहे.'हर घर जल' या घोषणेखाली योजना मंजूर झाली,भूमिपूजन झाले, फलकही उभे राहिले; मात्र आजही अनेक घरांपर्यंत नळाचे पाणी पोहोचलेले नसल्याची वस्तुस्थिती दिसून येत आहे. पालांदूर गावातील अनेक नळ पाणीपुरवठा योजनेची कामे अर्धवट अवस्थेत आहेत.काही ठिकाणी पाईपलाइन टाकून काम थांबले आहे,तर काही ठिकाणी नळजोडणीच झाली नाही.त्यामुळे येत्या उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार असल्याची माहिती आहे. पाणीटंचाईमुळे अनेक महिलांना रोज डोक्यावर हंडे घेऊन दूरवर जावे लागत आहे.काही कुटुंबे विहिरींवर किंवा दूरच्या नळांवर अवलंबून आहेत.महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन असूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणे,ही गंभीर बाब आहे.निधी वेळेवर न मिळणे,ठेकेदारांची दिरंगाई, निकृष्ट दर्जाची कामे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे योजना रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.उद्घाटनांचे फोटो प्रसिद्ध होतात;मात्र नळातून पाणी येत नाही,अशी नाराजी नागरिकांमध्ये आहे. पालांदूर गावातील रखडलेल्या नळ पाणीपुरवठा कामांचा तातडीने आढावा घ्यावा,निधी उपलब्ध करून द्यावा,दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी आणि प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवावे,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. वर्षभर महिलांना डोक्यावर हंडा घ्यावा लागतो पालांदूर गावातील अनेक वार्डांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेची कामे अर्धवट अवस्थेत आहेत.कुठे पाइपलाइन टाकून ठेवण्यात आली आहे,तर कुठे नळजोडणीच अपूर्ण आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर' यंदाच्या उन्हाळ्यात तरी नळातून पाणी मिळणार का?'असा सवाल ग्रामस्थांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. गावातील पाणीटंचाई ही केवळ उन्हाळ्यापुरती मर्यादित नसून, अनेक वॉर्डांतील महिलांना वर्षभर डोक्यावर हंडे घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे भीषण वास्तव आहे. पाणी टंचाईपूर्वी दखल घेण्याची मागणी... उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जानेवारी महिन्याच्या शेवटीच पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवू लागले आहे.कित्येक नळांना तोट्याच नाहीत.त्याद्वारे पाणी वाया जात आहे.ते रोखण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करण्याची गरज आहे. आज अखेर झालेल्या ग्रामसभा, मासिक सभेच्या बैठकांतून वेळोवेळी वाया जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न सर्वसामान्य ग्रामस्थांसह विद्यमान सदस्यांनी अचूकपणे मांडला.मात्र तेवढ्यापुरतेच लक्ष दिले जाते. ठोस उपाययोजना केली जात नाही. सरपंचांनी याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे.
भारतीय संविधानाच्या बळावरच विविध भाषा, धर्म, जाती व संस्कृती असलेला भारत देश जगातील सर्वात मोठे व यशस्वी लोकशाही राष्ट्र म्हणून उभा आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही व्यवस्था टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण व संचलनासह मुख्य शासकीय समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीय, सैन्यदल, निमलष्करी व पोलीस दलांचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करत शपवार यांनी त्यांना भावपूर्ण वंदन केले. गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद-मराठवाडा मुक्ती संग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीरांचेही त्यांनी अभिवादन केले. देशाची एकता, अखंडता व सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पद्म तसेच शौर्य पुरस्कार विजेत्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केंद्र सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या शौर्य व सेवा पदक तसेच पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील मान्यवरांचा समावेश हा राज्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. पोलीस, अग्निशमन, होमगार्ड व सुधारात्मक सेवांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह कला, उद्योग, समाजसेवा, क्रीडा, वैद्यकीय व कृषी क्षेत्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांनी महाराष्ट्राची मान देशपातळीवर उंचावली असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यलढा व सामाजिक सुधारणांच्या चळवळीत पुण्याची भूमिका ऐतिहासिक व निर्णायक राहिल्याचेही त्यांनी सांगितले. शेती, उद्योग, व्यापार, सहकार, बँकिंग, आरोग्य व पायाभूत सुविधांच्या विकासात पुणे जिल्हा अग्रेसर असून आयटी हब, ऑटो हब आणि स्टार्टअप्सचे प्रमुख केंद्र म्हणून पुण्याची ओळख देश-विदेशातील तरुणांना आकर्षित करत असल्याचे पवार म्हणाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, अभिव्यक्ती व धार्मिक स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाची हमी दिल्यामुळे भारताची लोकशाही अधिक मजबूत झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवरच महाराष्ट्राची प्रगती उभी असून हेच विचार राज्याच्या व देशाच्या शाश्वत विकासाचा मंत्र असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. हे विचार सर्वांनी जपावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. भारतीय सैन्यदल, नौदल, वायुदल, निमलष्करी दल, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन दल यांच्या अतुलनीय सेवेचा त्यांनी गौरव केला. सीमेवरील त्याग, देशांतर्गत सुरक्षेसाठी केलेले बलिदान व आपत्तीच्या प्रसंगी दाखवलेली तत्परता प्रेरणादायी असल्याचे अजित पवारांनी नमूद केले. लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून संविधानाचे पालन, कायद्याचा आदर, सामाजिक सलोखा व विविधतेत एकता जोपासणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे युनिटचे उपअधीक्षक दयानंद सदाशिव गावडे, पोलीस निरीक्षक अविनाश रोकडेराव शिळीमकर, एसआरपीएफ गट क्रमांक–१ मधील सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप साहेबराव सानंतु, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक आयुक्त विठ्ठल खेहुली कुबडे, तसेच महेंद्र दामोदर कोरे, अमोल फडतरे आणि उपअधीक्षक अनंत माळी यांचा समावेश होता. ‘स्वच्छ पुणे संकल्प–2026’ प्रचार प्रसिद्धी रथास झेंडी पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छ पुणे संकल्प–2026 या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धी रथाला आज उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या त्रिसूत्रीवर आधारित स्वच्छ पुणे, सुंदर पुणे या संकल्पनेवर भर देण्यात आला. प्रचार रथाच्या माध्यमातून कचरा विलगीकरण, प्लास्टिकमुक्ती, स्वच्छता सवयी, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि नागरिकांची जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम,जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, पुणे पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री.विनय कुमार चौबे, पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. संदीपसिंह गिल, पुणे महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच स्वच्छता विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळला. यामुळे संतप्त झालेल्या एका महिला पोलिस अधिकाऱ्यांना महाजनांना जागेवरच जाब विचारला. यामुळे नाशिक येथील शासकीय ध्वजारोहणावेळी एकच वाद झाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. भारताने 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंगीकृत केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या संविधानाचे शिल्पकार मानले जातात. त्यामुळे साहजिकच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्याचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. पण गिरीश महाजन यांनी आपल्या संपूर्ण भाषणात एकदाही बाबासाहेबांचे नाव घेतले नाही. ते विसरले की त्यांनी ते जाणिवपूर्वक टाळले हे स्पष्ट झाले नाही. पण एका महिला पोलिस अधिकाऱ्याने या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. थेट पालकमंत्र्यांनाच विचारला जाब माधवी जाधव असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या सध्या वन विभागात कार्यरत आहेत. त्यांनी या प्रकरणी थेट मंत्री महाजनांना बाबासाहेबांचे नाव का घेतले नाही? असा जाब विचारला. या अनपेक्षित प्रकारामुळे महाजन चांगलेच भांबावले. त्यानंतर पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेऊन त्यांचे बोलणे बंद करण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी खूप मोठी चूक केली आहे. मला निलंबित केले तरी चालेल, पण मी त्यांना जाब विचारल्याप्रकरणी माफी मागणार नाही. काय म्हणाल्या माधवी जाधव? वादावादीनंतर पत्रकारांपुढे आपली बाजू मांडताना माधवी जाधव म्हणाल्या, गिरीश महाजनांनी आपल्या भाषणात कुठेही बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले नाही. जी व्यक्ती संविधानाला कारणीभूत आहे. त्याला तुम्ही संपवायला निघालात? पालकमंत्र्यांची ही फार मोठी चूक आहे. मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांनी ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी देणेघेणे नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन, माती काम करेन. पण मी बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला निलंबित करायचे असेल तर करू शकता. पण बाबासाहेबांना संपवायचे काम मी करू देणार नाही. मी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या तारखांना मानत नाही. पण लोकशाही मानते, असे त्या म्हणाल्या. संविधानाशी संबंध नसलेल्यांचे वारंवार नाव घेतले यावेळी अन्य एक महिला पोलिस अधिकारी माधवी जाधव यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यावेळी माधवी त्यांना म्हणाल्या, मॅडम तुम्ही देखील संविधानामुळे आहात. पालकमंत्रीही संविधानामुळे आहेत. बाबासाहेबांचे नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचे नाव एकदाही भाषणात आले नाही. लोकशाही व संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावे वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा व प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचे नाव भाषणात का आले नाही? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला.
तिरंगा ही देशाची आन, बान व शान आहे. तिरंग्यासाठी आपल्या अनेक लोकांनी रक्त सांडले आहे. आज काही जातीयवादी व धर्मांध शक्ती स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील घराघरात मनामनात तिरंगा पोहोचवला पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केले. 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते मुंबई स्थित राज्य काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनात ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, सरचिटमीस प्रफुल्ल गुडदे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस जोजो थॉमस, झिशान अहमद, श्रुती म्हात्रे आदी नेते उपस्थित होते. एमआयएमच्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवा करण्याची घोषणा केली. त्यावर भाजपने आक्षेप घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांत राजकीय कलगीतुरा रंगला असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी उपरोक्त आवाहन केले. तिरंगा एक विचार, एक स्वप्न हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, स्वातंत्र्याचा लढा व स्वातंत्र्यानंतर देश उभारणीत काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. ही एक मोठी साधना आहे. या साधनेला संघर्षाची जोड आहे. संघर्षाचा हा मुलमंत्र आपण जपला पाहिजे. आज देशात काही शक्ती जातीपातीचे, धर्माचे राजकारण करत आहेत. कुणाला हिरव्या रंगाचे, तर कुणाला भगव्या रंगाचे राजकारण करायचे आहे. हिरवा व भगवा या रंगाचा आदर आहेच. कारण, हिरवा रंग हा सुबत्तेचा, तर भगवा रंग हा त्यागाचे व सन्मानाचे प्रतिक आहे. तिरंगा हा एक विचार आहे. स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही आजही रक्त सांडण्यास तयार आहोत. भाजप व एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहेत. मोहम्मद अली जिना यांच्या पक्षासोबत जनसंघाने निवडणुका लढवल्या. त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी उपमुख्यमंत्री होते. आज त्याचे पुनरुज्जीवन केले जात आहे, असे ते म्हणाले. मनामनात, घराघरात तिरंगा पोहोचवा तिरंगा हा आपल्या देशाची आन, बान व शान आहे. तिरंग्यासाठी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले बलिदान दिले आहे. पण सध्या काही जातीयवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी व संविधानवादी लोकांनी मात्र भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात मनामनात, घराघरात तिरंगा पोहोचवण्याचा निर्धार करावा, असेही सपकाळ यावेळी बोलताना म्हणाले.
भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने जिल्हा परिषद परिसरात एकच खळबळ उडाली. जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा धक्कादायक प्रकार घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.वेळेत पोलिसांनी जमेची बाजू घेतली. स्वावलंबी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका रत्नमाला मेंढे यांच्यावर झालेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ प्रदीप कांबळे यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पर्यवेक्षक पदाला मान्यता देऊन वेतन काढण्यासाची जबाबदारी होती.पण माझ्यावर अन्याय केला असल्याचा आरोप रत्नमाला मेंढे यांनी केला असून, याविरोधात गेल्या आठवडाभरापासून शिक्षण विभागासमोर आंदोलन सुरू होते. यापूर्वीही प्रशासनाला इशारा देण्यात आला होता, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे. पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले, मोठा अनर्थ टळला सोमवारी रोजी अचानक प्रदीप कांबळे यांनी अंगावर डिझेल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न करताच उपस्थित पोलिस व कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी कांबळे आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत कांबळे यांना ताब्यात घेतले व मोठा अनर्थ टळला. दोषींवर कारवाईची मागणी या घटनेनंतर जिल्हा परिषद परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, रत्नमाला मेंढे यांना न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहर पोलिस धाव घेतली आहे.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी MIM च्या नगरसेविका सहर शेख यांच्या मुंब्रा हिरवा करण्याच्या विधानावर अत्यंत परखड मत व्यक्त केले आहे. कोणताही रंग कुणाच्या बापाचा नाही. सगळे रंग हे निसर्गाच्या बापाचे आहेत, असे ते म्हणालेत. ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी 'कैसा हराया' म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चिडवले होते. यावेळी त्यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवे करण्याचीही घोषणा केली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर अखेर सहर शेखने पोलिसांकडे आपला माफीनामा लिहून देत या प्रकरणावर पडदा टाकला. या पार्श्वभूमीवर अभिनेते सयाजी शिंदे यांनी या प्रकरणावर वरील परखड प्रतिक्रिया दिली आहे. कुणाला आव आणून रंग तयार करता येत नाही सयाजी शिंदे सोमवारी जुन्नर तालुक्यात देवराईच्या कामानिमित्त आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, निसर्गामध्ये सगळे रंग आहेत. ते कुणाला आव आणून तयार करता येत नाहीत. कोणताही रंग कुणाच्या बापाचा नाही. सगळे रंग हे निसर्गाच्या बापाचे आहेत. महाराष्ट्रातील पहिली देवराई ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जुन्नर तालुक्यातून सुरू करत आहे. संताचे जे दुर्लक्षित विचार राहिले, ते आम्ही पुढे घेऊन जात आहोत. इथे सध्या 1 हजार झाडे लावण्यात आली आहे. आणखी 10 हजार झाडे आम्हाला इथे लावायची आहेत. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तपोवनाची जागा सोडून त्यांनी कुठेही कुंभमेळा करावा. कुंभमेळा ही सुद्धा चांगली परंपरा आहे. पण झाडांची परंपरा ही त्याहून अधिक चांगली आहे. मला राजकारणातील फारसे कळत नाही. त्यात मला रसही नाही. हजारो वर्षांपासून राजकारण सुरू आहे. ते आजही सुरूच आहे. त्यात काहीही नवीन नाही, असेही सयाजी शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. आता पाहू नेमका काय आहे वाद? सहर शेख ह्या ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झाल्या. त्यांचा विजय जेवढा लक्षवेधी ठरला, तेवढीच चर्चा त्यांनी विजयानंतर केलेल्या भाषणाचीही झाली. आपल्या भाषणात त्यांनी 'कैसा हराया' म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे सहर शेख हे नाव राज्यभर गाजले. त्यांचे वडील युनूस शेख हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मुंब्रा परिसरात सक्रिय होते. ते मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष म्हणूनही काम करत होते. त्यामुळे यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल असे सांगितले जात होते. जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांना तसा शब्द दिला होता. पण नंतर त्यांनी तो पाळला नाही. त्यामुळे सहर शेख यांनी एमआयएमकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांचा दणदणीत विजय झाला. पण त्यानंतर झालेल्या विजयी सभेत त्यांनी आव्हाड यांच्यावर टीका केल्यामुळे त्या स्वतःच टीकेच्या धनी बनल्या.
केंद्र सरकारने मानधन वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी सुरू केलेल्या एसएनए (सिंगल नोडल एजन्सी) या नव्या प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील सुमारे १ लाख १४ हजार अंगणवाडी सेविकांचे डिसेंबर महिन्यापासून मानधन थकल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांना केंद्र सरकार व राज्य शासनाकडून एकत्रित मानधन दिले जाते. मात्र या प्रक्रियेत सुसूत्रता यावी, यासाठी केंद्र सरकारने एसएनए ही नवी प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीअंतर्गत आधार लिंक करणे, बँक खात्यांचे व्हेरिफिकेशन तसेच नावातील तफावत दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तथापि, प्रणालीतील सर्व्हर त्रुटी आणि तांत्रिक अडचणींमुळे ही कामे अत्यंत धीम्या गतीने होत असल्याने सेविकांचे मानधन रखडले आहे. त्यामुळे त्यांना घरखर्च सांभाळणे कठीण झाले आहे. एसएनए प्रणालीमुळे पारदर्शकता वाढली असली, तरी तांत्रिक अडचणींमुळे सेविकांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने थकित मानधन तत्काळ जमा करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सेविकांनी दिला आहे. चर्चेसाठी मंत्र्यांना मिळेना वेळ अंगणवाडी सेविकांचे मानधन पूर्वी पीएफएम प्रणालीद्वारे दिले जात होते. केंद्र सरकारने ती प्रणाली बंद करून, नवीन एसएनए प्रणालीद्वारे मानधन देण्याची सूचना केल्यामुळे राज्यातील एक लाख १४ हजार अंगणवाडी सेविकांना डिसेंबरपासून मानधन मिळालेले नाही. निवडणूक जिंकण्यासाठी लाडक्या बहिणींना मतदानापूर्वी पैसे दिले जातात, पण लाभार्थींना योजनेचे फायदे देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे वेळ नाही. - राजेश सिंग, संघटक सचिव, अंगणवाडी कर्मचारी संघटना तक्रारी करूनही मिळेना मानधन दरमहा मिळणाऱ्या मानधनावर आमचे कुटुंब चालते. महागाई वाढलेली असताना दोन-दोन महिने पैसे न मिळाल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही मानधन मिळत नाही. संबंधित विभागाने याबाबत लवकर त्रृटी दूर करून मानधन द्यावे. - गायत्री देसले, अंगणवाडी सेविका आठ दिवसांत मानधन जमा होईल टेक्निकल अडचण आहे. त्यामुळे मानधन रखडले आहे आठ दिवसांत मानधन जमा होतील. - सोमनाथ काकडे, लेखाधिकारी, आयुक्तालय
अमरावती जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आराखड्याचे प्रभावीपणे अनुपालन करण्याची जबाबदारी ही जिल्हा नियोजन विभागाची असतानासुद्धा त्यात वारंवार कुचराई व दिरंगाई केली जाते. परिणामी जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन बिघडल्याची वास्तविकता आमदार संजय खोडके यांनी पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्यास विलंब लागत असल्याने निर्धारित वेळेत सर्व रक्कम खर्च होत नाही, हे शल्य व्यक्त करुन आमदारांनी मांडलेल्या सूचनांचे अनुपालनच होत नसेल तर आमच्या बोलण्याला अर्थ काय ? असा बोचरा सवालही आमदार खोडके यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत उपस्थित केला. या प्रश्नानंतर पालकमंत्र्यांनी तत्कालीन डीपीओंच्या चौकशीचे आदेश दिले. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी डीपीसी पार पडली. बैठकीच्या प्रारंभीच गेल्या सभेचे इतिवृत्त मंजूर करण्याचा विषय पुढे आला. त्यावर भाष्य करताना पीठासीन सभापती या नात्याने पालकमंत्री बावनकुळे यांनी याबाबत लोकप्रतिनिधींना सुचना मांडण्यास सांगितले. यावेळी आमदार संजय खोडके यांनी अत्यंत उद्विग्न होऊन वरील मत व्यक्त केले. ते म्हणाले, लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही जिल्हा नियोजनाच्या बैठकीत वारंवार प्रश्न उपस्थित करतो. परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही होत नाही. पैसे अडवून ठेवले जातात. एवढेच नव्हे तर आम्ही मांडलेल्या मुद्द्यांचा सदर विभागाकडून पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुद्धा केल्या जात नाही. अशा विचित्र वागण्यामुळे विकास कामे प्रलंबित राहतात. यामुळे या विभागावर प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे विकास खुंटल्याचा आरोप करण्यात आला. आमदारांच्या मुद्द्यांचे तत्काळ होणार अनुपालन डीपीसीच्या बैठकीत नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या काही प्रश्नांमुळे उपस्थित असलेले सारेच अधिकारी आश्चर्यचकीत झाले होते. दरम्यान त्या मुद्द्यांचे गांभीर्य लक्षात घेता यापुढे आमदारांच्या सूचनांना गंभीरतेने घेण्याच्या सूचना जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. बैठक आटोपल्यानंतर समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी स्वतंत्रपणे बोलताना त्यांनी या सूचना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांचेही ऑडिट तपासण्याचे आदेश दरम्यान या मुद्द्याला अत्यंत गंभीरतेने घेत पालकमंत्री बावनकुळे यांनी तत्कालीन डीपीओ अभिजित म्हस्के यांची विभागीय चौकशी करुन संलग्न अधिकाऱ्यांचे सुद्धा ऑडिट तपासण्याचे आदेश दिले. त्याबरोबर जिल्हा नियोजनाच्या बैठकीत आमदारांनी मांडलेल्या प्रश्नाचे तातडीने अनुपालन करून संबंधित विभागप्रमुखांच्या स्वाक्षरीनिशी कार्यवाहीबाबतची माहिती अवलोकनार्थ सादर करण्याचे आदेश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.
राजस्थान सरकारने ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर विद्यमान निवर्तमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. असे असताना महाराष्ट्र सरकार मात्र लोकनियुक्त सरपंचांना डावलून शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याच्या दिशेने जात असल्याचा आरोप सरपंच संघटनांनी केला आहे. राजस्थानच्या ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाने १६ जानेवारी २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ ३१ जानेवारी २०२५ पर्यंत संपत आहे आणि अपरिहार्य कारणांमुळे निवडणुका होऊ शकत नाहीत, त्या ग्रामपंचायतींमध्ये निवर्तमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच उपसरपंच व वार्डपंचांचा समावेश असलेली प्रशासकीय समिती स्थापन करून गावाचा कारभार लोकप्रतिनिधींच्याच मार्गदर्शनाखाली सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याऊलट महाराष्ट्रात मात्र १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत संपुष्टात येणाऱ्या ग्रामपंचायतींवर सरपंचांना डावलून ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि विस्तार अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नेमले जाणार आहे. अमरावती जिल्ह्यात अशा ५५० ग्रामपंचायती आहेत. दरम्यान शासनाच्या ताज्या निर्णयामुळे लोकशाही धोक्यात आली असून ग्रामस्वराज्य आणि ग्रामीण विकासावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके आणि प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “राजस्थान सरकार लोकनियुक्त सरपंचांवर विश्वास ठेवते, मग महाराष्ट्र सरकारला लोकप्रतिनिधींवर विश्वास का नाही ? हा लोकशाहीविरोधी आणि ग्रामस्वराज्याला कमजोर करणारा निर्णय आहे.”, असे त्यांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते, राजस्थान सरकारचा निर्णय लोकशाही, विकेंद्रीकरण आणि ग्रामस्वराज्य मजबूत करणारा असून, तो महाराष्ट्रासाठीही आदर्श ठरू शकतो. यामुळे आता संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यभर आंदोलनाचा संघटनेने दिला इशारा संघटनेने महाराष्ट्र सरकारकडे राजस्थानप्रमाणेच धोरण स्वीकारण्याची ठाम मागणी केली आहे. दरम्यानच्या काळात जर लोकनियुक्त सरपंचांना प्रशासक म्हणून मान्यता दिली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. “राजस्थानमध्ये जे शक्य आहे, ते महाराष्ट्रात अशक्य का ? लोकशाहीचा मान राखा, ग्रामस्वराज्य वाचवा,” अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.
महाराष्ट्राची वाटचाल दुष्काळ मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. पुढील टप्प्यात सरकार शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त केले. आता महाराष्ट्र थांबणार नाही. आपल्या संविधानाने दिलेल्या व्यवस्थेच्या बलावर राज्य अधिक गतिमान व समृद्ध होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, भारताने 26 जानेवारी 1950 रोजी संविधान स्वीकारून लोकशाही प्रजासत्ताकाची पायाभरणी केली. आपल्याला जगातील सर्वोत्तम संविधान लाभले. त्यामुळे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान निर्मिती समितीला मानवंदना अर्पण करतो. देशाची प्रगती ही स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांवर उभी आहे. आता महाराष्ट्र थांबणार नाही. आपल्या संविधानाने दिलेल्या व्यवस्थेच्या बलावर राज्य अधिक गतिमान व समृद्ध होईल. विकासाच्या प्रक्रियेत सर्वच घटक सहभागी ते पुढे म्हणाले, भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. महाराष्ट्राचे देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून काम करत आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. दावोस येथे सुमारे 30 लाख कोटींचे करार झाले. यामुळे राज्यातील सर्वच घटक विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होत असल्याचे स्पष्ट होते. यामुळे रोजगार निर्मितीलाही चालना मिळते. शेतकरी हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे नमूद करत फडणवीस म्हणाले, शेतीला पाणी, वीज व बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सातत्याने धोरणात्मक निर्णय घेत आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने जलसंधारण, सिंचन व पाणी व्यवस्थापनावर भर देण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून, एमएमआरडीएच्या माध्यमातून विविध महत्त्वाचे प्रकल्प राबवले जात आहेत. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येत आहेत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात असून, सर्वसामान्यांना निवाऱ्याचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिलांसाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी विविध कृषी उपक्रम, तसेच मोफत वीज योजनेसारख्या निर्णयांद्वारे समाजातील विविध घटकांचा सर्वांगिन विकास साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. सत्ता, संघर्षापेक्षा देश मोठा - एकनाथ शिंदे दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्ता, संघर्षाच्या राजकारणापेक्षा देश मोठा असतो असे नमूद करत संविधानामुळेच प्रत्येक नागरिकाला न्याय व स्वातंत्र्य मिळाल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले, विकास हाच आमच्या सरकारचा मुख्य अजेंडा आहे. मराठी माणसाची ताकद केवळ मुंबईपुरती मर्यादित नाही. चाद्यापासून बांद्यापर्यंत मराठी माणसांचे साम्राज्य आहे. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही. पण राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न करतो. सरकार राज्याच्या सर्वांगिन विकासासाठी कटिबद्ध आहे. निवडणुकीत मायबाप जनतेने भावनेचे राजकारण करण्यांऐवजी विकासाला प्राधान्य देणाऱ्यांना सत्ता दिली. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. दावोस येथील 30 लाख कोटींच्या करारामुळे राज्यात 40 लाख रोजगार निर्मिती होईल. राज्यातील शहरे झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर दिला जाईल. लवकरच मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असेही उपमुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.
मनपा निवडणूकीत भाजपला सर्वाधिक २५ जागा मिळाल्या आहे, तरीही २०१७ च्या तुलनेत २० जागांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात शनिवारी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोअर कमिटीसोबत दोन ते अडीच तास मंथन केले. यावेळी पराभवाचे काही कारणं त्यांच्या समोर आलेले आहेत. दरम्यान पराभवाची आणखी कारणं जाणून घेण्यासाठी भाजपची राज्यस्तरीय समिती लवकरच शहरात येणार असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. येथील शासकिय विश्राम भवनावर आमदार प्रताप अडसड, आमदार उमेश यावलकर, आमदार प्रविण तायडे, आमदार राजेश वानखडे, शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, माजी मंत्री प्रविण पोटे, माजी खासदार नवनित राणा, किरणताई महल्ले, जयंत डेहनकर, प्रा. रविन्द्र खांडेकर, प्रा. दिनेश सुर्यवंशी, किरण पातुरकर आदी सदस्यांसोबत पालकमंत्री बावनकुळे यांनी बैठक घेतली. नाराजीमुळेच ४ ते ५ जागांचे नुकसान निश्चितच झाले एक जागेवर एकाच उमेदवाराला उमेदवारी देऊ शकतो. असे काही व्यक्ती होते कि, त्यांना उमेदवारी द्यायची मनातून ईच्छा असूनही देऊ शकलो नाही. मात्र पक्षाने तिकीट दिली नाही म्हणून इतर पक्षात जाणे किंवा पक्षविरोधी काम करणे योग्य नाही. अशा नाराजांमुळे आम्हाला निश्चितच ४ ते ५ जागांचे या ठिकाणी नुकसान झाले आहे. तसेच आमचे आठ ते नऊ उमेदवार हे दोनशे मतांच्या फरकाने पराभुत झाले असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. गट नेतेपदी महिलेला संधी! अशावेळी गटनेता म्हणून महिलेची सुध्दा वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजपच्या महिला नगरसेविकांची संख्या अधिक असल्यामुळे महापौर महिलाच करण्यात यावी, अशीही एक मागणी पालक मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. तूर्तास गटनेत्याबाबत २६ जानेवारीपर्यंत निर्णय घेऊ आणि त्यापुढील दोन ते तीन दिवसात कोअर कमिटीचे मत विचारात घेऊन पार्लमेंटरी बोर्ड नाव ठरवेल.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ४०९ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विविध कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या कामांमुळे ग्रामीण भागातील १३ हजार १८३ मजुरांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. त्यामुळे मनरेगा योजना सध्या ग्रामीण मजुरांसाठी मोठा आधार ठरत असल्याचे चित्र आहे. जॉब कार्डधारक मजुरांना संबंधित ग्रामपंचायतीमार्फत गावात किंवा गावालगत रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे कामाच्या शोधात गाव सोडून जाण्याची वेळ मजुरांवर आलेली नाही. मनरेगाअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना प्रतिदिन ३१२ रुपये मजुरी दिली जात आहे. २००८ पासून केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त माध्यमातून मनरेगा योजना देशभर राबवण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील हजारो जॉब कार्डधारक नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. जॉब कार्ड असलेल्या व्यक्तीने मागणी केल्यास संबंधित ग्रामपंचायतीने वर्षातून किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. सार्वजनिक कामांवरील मजुरांची हजेरी ऑनलाइन, तर इतर कामांवरील हजेरी ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते. ग्रामरोजगार सेवकांवर मस्टरची जबाबदारी मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची दररोज हजेरी घेणे, सात दिवसांचे मस्टर तयार करून ते संबंधित पंचायत समितीकडे सादर करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सहायकांवर असते. शासनाकडून त्यांना मोबदला दिला जात असला तरी निधीअभावी हा मोबदला वेळेवर मिळत नसल्याने अनेक ग्रामरोजगार सेवकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तालुकानिहाय मजुरांची संख्या २३ जानेवारी रोजीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील मनरेगावरील एकूण मजुरांची संख्या १३,१८३ इतकी आहे. या योजनेमुळे ग्रामीण मजुरांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात एकूण ८८९ ग्रामपंचायती असून, त्यापैकी २३ जानेवारी रोजी केवळ ४०९ ग्रामपंचा यतींमध्ये मनरेगाची कामे सुरू आहेत. यात बुलडाणा ६, चिखली ८०, देऊळगावराजा २४, जळगाव जामोद २०, खामगाव ५२, लोणार २५, मलकापूर ३५, मेहकर ५४, मोताळा २, नांदुरा ५१, संग्रामपूर ३१, शेगाव ९, सिंदखेडराजा २०. यामध्ये सर्वाधिक कामे चिखली तालुक्यात, तर सर्वात कमी कामे मोताळा तालुक्यात सुरू आहेत. जिल्ह्यात तालुकानिहाय मजूर संख्या पुढीलप्रमाणे बुलडाणा ७२, चिखली २,९३९, देऊळगावराजा ३०१, जळगाव जामोद ९९८, खामगाव १,२६२, लोणार ७२२, मलकापूर ९९९, मेहकर २,०२५, मोताळा ११४, नांदुरा १,५९१, संग्रामपूर १,२५२, शेगाव २७६, सिंदखेडराजा ६३२.
महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक १३ सदस्यांनी ४६ उमेदवारी अर्ज घेतले. यात महापौर पदासाठी भाजपच्या चार तर शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका आेबीसी महिला प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, शारदा रणजीत खेडकर, वैशाली विलास शेळके,अॅड कल्पना संजय गोटफोडे आणि योगीता गणेश पावसाळे या चार ‘लाडक्या बहिणीं’चे उमेदवारी अर्ज भाजप पक्षश्रेष्ठींकडे सादर झाले असून, यापैकी महापौर पदाचा उमेदवार म्हणून कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे अकोलावासीयांचे लक्ष लागून आहे. काँग्रेसतर्फे निखत शाहीन अफसर अहमद कुरेशी, शिवसेनेतर्फे (उबाठा) सुरेखा मंगेश काळे यांनी महापौरपदासाठी अर्जांची उचल केली. २६ जानेवारीला सकाळी ११ ते ५ या वेळात महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. रविवारी भाजप, शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महापौर पदासाठी ६ सदस्यांनी २० उमेदवारी अर्जाची उचल केली तर उपमहापौर पदासाठी भाजप, शिवसेना (उबाठा) आणि वंचित या तीन पक्षांचे मिळून ७ सदस्यांनी २६ उमेदवारी अर्जांची उचल केली. २६ जानेवारीला उर्वरित पान ४ सदस्यांचे नाव पद अर्ज संख्या पक्ष {शारदा खेडकर महापौर ४ भाजप {वैशाली शेळके महापौर ४ भाजप {योगीता पावसाळे महापौर ४ भाजप {अॅड. कल्पना गोटफोडे महापौर ४ भाजप {सुरेखा काळे महापौर २ शिवसेना (उबाठा) {निखत शाहीन कुरेशी महापौर २ काँग्रेस {नितीन ताकवाले उपमहापौर ४ भाजप {धनंजय धबाले उपमहापौर ४ भाजप {अमोल मोहोकार उपमहापौर ४ भाजप {अमोल गोगे उपमहापौर ४ भाजप {विजय इंगळे उपमहापौर ४ शिवसेना (उबाठा) {सागर भारुका उपमहापौर २ शिवसेना (उबाठा) {पराग गवई उपमहापौर ४ वंचित एकाच्या नावे उचल दुसरा उमेदवार भरू शकतो अर्ज महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्जाची ज्या उमेदवाराच्या नावाने उचल केली त्याच उमेदवाराने तो अर्ज भरावा, असे बंधनकारक नाही. काही पक्षाच्य उमेदवारांनी प्रत्येकी दोन ते चार उमेदवारी अर्जाची उचल केली असल्याने ते आपल्या पक्षातील इतर उमेदवारांसाठी तो अर्ज वापरू शकतात. त्यामुळे ज्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी महापौर, उपमहापौर पदासाठी अर्जांची आज रविवारी उचल केली तेच उद्या सोमवारी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरतील, असे नाही. परिणामी पक्षातर्फे ऐनवेळी कुणीही सदस्य उमेदवारी अर्ज दाखल करू शकेल, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्यारणधुमाळीत एबी फॉर्म वाटपामुळे भाजपमधील अंतर्गतसंघर्ष एका टोकालाच गेला आहे. उमेदवारांच्या यादीवरपालकमंत्री जयकुमार गोरे यांचेच वर्चस्व दिसत आहे.भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यात चांगलाच जम बसवलाआहे. गेली २ ते ३ महिन्यांपासून पक्षात चांगलेच इनकमिंगसुरू आहे. त्यामुळे निवडणुकीत उमेदवारी देताना प्रमुखांनाअनेक अडचणींना, रोषाला सामोरे जावे लागले. त्यामध्येपक्षात नवीन आलेल्यांना उमेदवारी देणे गरजेचे असतानाजुने कार्यकर्ते मात्र नाराज झाले आहेत. तर जिल्ह्यातभाजपात नव्याने आलेल्या १८ आयारामांना संधी दिली. माळशिरसमध्ये माजी आमदार राम सातपुते, मंगळवेढ्यातआमदार समाधान आवताडे, पंढरपुरात भाजप नेते प्रशांतपरिचारक, मोहोळमध्ये माजी आमदार राजन पाटील,दक्षिणमध्ये आमदार सुभाष देशमुख तर उत्तरमध्ये माजीआमदार दिलीप माने यांनी सुत्रे हलवली.विशेष म्हणजेअधिकृत उमेदवारी मिळालेल्यांना ही नाराजांच्या मेळाव्यालाहजेरी लावली. पंढरपूर तालुक्यात तिघांना उमेदवारी पंढरपूर तालुक्यात तिघांना उमेदवारी दिली. करकंबगटामधून राष्ट्रवादीतून आदिनाथ देशमुख यांना भाजपनेउमेदवारी दिली. तर भोपे इथून राष्ट्रवादीचे प्रफुल्लतापाटील यांना भाजपने तिकीट दिले. वाखरी जिल्हा परिषदगटातून राष्ट्रवादीचे मोनिका समाधान काळे यांनाभाजपने उमेदवारी दिली. मंगळवेढ्यात दोघांना उमेदवारी हुलजंती गटातून भाजपाचे संगीता दुधाळयांना उमेदवारी देण्यात आली. याठिकाणाहून इच्छुक प्रदीप खांडेकर यांनाभोसे गटात निवडणूक लढवावी लागली.काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष कवचाळेयांना ऐनवेळी भाजपने उमेदवारी दिली. मोहोळमध्ये ३ उमेदवारी मोहोळ जिल्हा परिषद, पंचायत समितीनिवडणूकीत भाजप पक्षात नवीनआलेल्या उबाठाचे लखन शिंदे नरखेडयांना उमेदवारी देण्यात आली तरजगन्नाथ कोल्हाळ यांना थांबण्याची वेळआली.नव्यानेच राजकारणात सचिनजाधव यांना उमेदवारी दिली. अकलूजमध्ये तिघांना उमेदवारी अकलूजमध्ये जिल्हा परिषद व पंचायतसमितीच्या निवडणुकीसाठी पक्षात नवीनआलेल्या अमृतराज माने देशमुख, वेळापूरपंचायत समिती गण,तसेच राजेश्वरी मानेदेशमुख यांना संग्रामनगर पंचायत समितीगण तर चंद्रकांत जाधव यांना पिलीव जिल्हापरिषद गटातून भाजपने उमेदवारी दिली. माढ्यात चौघांना उमेदवारी दिली मानेगांव जिल्हा परिषद गटामध्ये सुहासपाटील जामगांवकर यांना डावलून पृथ्वीराजसावंत यांना उमेदवारी. टेंभूर्णी जिल्हा परिषदगटातून अंजनादेवी पाटील चांदजकर यांनाडावलून अमृता वाघे यांना उमेदवारीदिली.भोसरेत गटात शुभांगी उबाळे यांनाडावलून अश्विनी दळवे यांना उमेदवारी. दक्षिणमध्ये दोघांना उमेदवारी बोरामणी जिल्हा परिषद गटात भाजपचेनिष्ठावान सिद्धाराम हेले डावलून नेताजीखंडागळे यांना भाजपकडून उमेदवारीदेण्यात आली आहे. हत्तुर गणामध्येभाजपचे प्रशांत सलगरे यांना वगळूनपंचाप्पा धनशेट्टी यांना उमेदवारी दिली. उत्तरमध्ये एकाला संधी माजी आमदार दिलीपराव माने यांच्याभाजप पक्षात झालेल्या प्रवेशामुळेनान्नज गटातील राजकीय समीकरणेबदलली. माजी आमदार दिलीपराव मानेयांचे निकटवर्तीय श्रीकांत मुळे यांनाभाजपकडून अधिकृत उमेदवारी दिली. बंडखोरी शांत केल्यानंतरही अस्वस्थता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वपक्षांचा भर नुकसान टाळणे हाच आहे. बंडखोरीरोखण्यासाठी केवळ राजकीय नव्हे तर भावनिक आणिव्यक्तिगत पातळीवरही प्रयत्न झाले. अनेक ठिकाणीवरिष्ठ नेत्यांचे फोन, प्रत्यक्ष भेटी मध्यस्थी आणिआश्वासनांचे राजकारण पाहायला मिळाले. बंडखोरीरोखण्यात यश आले असले तरी काही तालुक्यात मात्रअजूनही अस्वस्थता कायम आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. भाजपने परवानगी दिली तर मी यांचे नामोनिशाण मिटवून टाकेन. आज पुन्हा मी हे बोलत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजप व शिंदे गटातील कथित वाद पुन्हा एकदा टोकाला पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीवेळी मुंबईत गणेश नाईक व शिंदे गटात मोठा राजकीय कलगीतुरा रंगला होता. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हा कलगीतुरा संपण्याची शक्यता होती. पण आता भाजप नेते तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्या वरील विधानामुळे हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत. ते सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, भाजपने परवानगी दिली तर मी यांचे नामोनिशाण मिटवून टाकेन. मी आज हे पुन्हा बोलत आहे. भाजप हा शिस्त पाळणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाने आदेश दिला म्हणून मी ते मान्य केले. मनाला पटले नसले तरी कार्यकर्त्यांनी ते शांतपणे सहन केले. पक्ष नेतृत्वाचा निर्णय आम्ही मान्य केला. एकेकाळी मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) महायुतीमधील सर्व कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे लढू द्यावे. निवडणुकीनंतर ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून येतील त्यांना मित्र पक्षांनी पाठिंबा द्यावा व उर्वरित पदांची वाटणी करावी असे माझे मत होते. मी ही बाब मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घातली होती. त्यांनी त्यावर होकार दिला नाही आणि नकारही दिला नाही. आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा आम्हाला होती. पण काही ठिकाणी ती संधी मिळालीच नाही, असे ते म्हणाले. ठाण्यात भाजपने आपल्या घोड्यांचे लगाम खेचले गणेश नाईक पुढे म्हणाले, नवी मुंबईत शिंदे गटाकडून 57 जागांची मागणी करण्यात आली. पण आमची त्यांना 20 ते 22 जागा देण्याची तयारी होती. शेवटच्या दिवसापर्यंत चर्चेच्या फैऱ्या सुरू होत्या. अखेर त्यांनी एबी फॉर्म भरले. त्यानंतर आम्हीही भरले. त्यानंतर जे झाले ते चांगलेच झाले. ठाण्यातील लोकांना काही करामत करता आली नाही. ठाण्यात भाजपच्या घोड्यांचे लगाम खेचले गेले. कल्याणमध्येही तेच झाले. त्यानंतरही पक्षाला जे मान्य होते तेच आम्ही मान्य केले. हे मी बोलणार नाही तर कोण बोलणार? भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. एकदा आदेश दिला की, तिथे इतर काही येत नाही. हे मी बोलणार नाही तर कोण बोलणार? त्यानंतरही कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त पाळली. हे कौतुकास्पद आहे. सगळ्या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढली असती आणि ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून आले त्यांना महापौर पदासह इतर प्रमुख पदे मिळाली असती. पण हे माझे पूर्णपणे वैयक्तिक मत आहे, असेही गणेश नाईक यावेळी बोलताना म्हणाले.
मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालाला 10 दिवस लोटलेत. पण अद्यापही सत्ताधारी भाजप व शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांची गटनोंदणी केली आहे. हे दोन्ही पक्ष कोकण आयुक्तांकडे संयुक्त गटनोंदणी करतील अशी माहिती होती. पण आता शिंदे गट स्वतःच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व जपण्यासाठी स्वतंत्र गटनोंदणी करणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. भाजपचे कथित वर्चस्व झुगारून टाकण्यासाठी शिंदे गटाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, भाजप व शिंदे गटात सध्या बीएमसीच्या महापौरपद, उपमहापौरपद, विविध वैधानिक व विशेष समित्यांच्या अध्यक्षपदासह सदस्यसंख्येप्रकरणी चर्चा सुरू होती. विशेषतः या प्रकरणी पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीमधील सदस्यसंख्येवरून गणिते मांडली जात होती. सध्याच्या रचनेनुसार स्थायी समितीत सत्ताधारी व विरोधकांची सदस्यसंख्या समसमान येत आहे. शिक्षण समितीचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य असल्याने सत्ताधारी गट केवळ एका सदस्याने आघाडीवर आहे. शिक्षण समिती अध्यक्ष वगळता सत्ताधारी व विरोधकांचे प्रत्येकी 13 सदस्य स्थायी समितीवर जातील अशी स्थिती आहे. शिंदे गटाला काय आहे धोका? भाजप व शिंदे गटाची संयुक्त गट नोंदणी झाल्यास गुणोत्तर प्रमाणात बदल होऊन सत्ताधाऱ्यांचा 1 सदस्य वाढू शकतो. पण संयुक्त नोंदणी झाल्यानंतर महापालिकेत भाजप - शिंदे गटाचा एकच गटनेता असेल. सभागृहात तसेच सर्वच समित्यांत भाजप जी भूमिका घेईल, तिला शिंदे गटाला अनिवार्यपण पाठिंबा द्यावा लागला असता. याशिवाय महापालिकेत दोन्ही पक्षांना स्वतंत्र कार्यालय मिळण्याऐवजी एकच कार्यालय मिळण्याची शक्यता होती. एवढेच नाही तर समित्यांवर शिंदे गटाला किती प्रतिनिधित्व द्यायचा याचा अंतिम निर्णयही भाजपच्याच गटनेत्याकडे राहण्याचा धोका होता. स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी निर्णय सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार, स्वतंत्र गटनोंदणी झाल्यास स्थायी समितीवर भाजपचे 8 व शिंदे गटाचे 3 सदस्य जाण्याची शक्यता आहे. पण संयुक्त गट झाल्यास शिंदे गटाचे किती सदस्य स्थायी समितीवर पाठवायचे याचे सर्वाधिकार भाजपकडे गेले असते. यामुळे शिंदे गटाने स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे महापालिकेत सत्ताधारी पक्ष महायुती म्हणून काम करणार असले तरी सत्तेतील समतोल व समित्यांवरील वाटाघाटींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खालील तक्त्यात पाहा मुंबई महापालिकेचे पक्षीय संख्याबळ
भाजप हा नेता चोरणारा पक्ष आहे. शिवसेना नेता घडवणारी पार्टी आहे. सोलापुरात १०२ पैकी भाजपचे ८७नगरसेवक निवडून आले. याचे श्रेय पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देण्याचे कारणच नाही. हे यश म्हणजे भाजपच्या कूटनीती, कपटनीतीचा करिष्मा आहे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या तथा सोलापूर संपर्क प्रमुख सुषमा अंधारे यांनी लगावला. श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सोलापूर जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्या प्रथमच सोलापुरात आल्या होत्या. त्या म्हणाल्या, आम्ही सभागृहात कमी संख्येत असलो तरी आमचा वचक असणार. सध्या कठीण प्रसंग आहे. आमचा कार्यकर्ता खचणारा नाही. भाजपकडे पैसे भरपूर आहेत, तो ईडीला कधी दिसत नाही. तो पैसा आज जोर करतोय. ईडीला समोर करून दबाव आणला जात आहे. क्लिन चिट मिळाल्यानंतर भाजप विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणारे संजय राऊत एकमेव नेते आहेत. मी महिला असल्याचा व्हिक्टिम कार्ड कधीच वापरत नाही. बाई समजून मला कोणी हलक्यात घेऊ नये. अन्यथा अडचण होई शकते, असा इशारा अंधारे यांनी दिला. आघाडीची महिन्यातून एकदा आढावा बैठक पुढील निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडीचे एकत्रितपणे नियोजन करून पावले उचलू. नियोजन करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची महिन्यातून एकदा आढावा बैठक घेऊ. सुसंवाद घडवू, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेऊन सोडवू. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हातात हात देऊन लढा देऊ, अशा शब्दात अंधारे यांनी मार्गदर्शन केले. मतभेद विसरू.. एकदिलाने राहू आपल्याला महाविकास आघाडी मजबूत करायची असेल तर एकदिलाने राहावे लागेल. आपसातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. एकत्र येऊन भविष्य घडवू, असे मार्गदर्शन सुषमा अंधारे यांनी केले. हॉटेल सिटी पार्क येथे महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना अंधारे म्हणाल्या, महापालिका निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पक्षात बंडखोरी झालीच. यापुढे कधीही बंडखोरी होऊ नये म्हणून प्रयत्न करु. प्रयत्न करूनसुद्धा बंडखोरी झाली तर बंडखोरांवर कडक कारवाई करु. यावेळी शिवसेनेचे अजय दासरी, राष्ट्रवादीचे महेश गादेकर, शंकर पाटील, चंद्रकांत पवार, काँग्रेसचे नरसिंग आसादे, आरिफ शेख, बाबा मिस्त्री, रियाज हुंडेकरी उपस्थित होते. इम्तियाज जलील प्रकरण-हा स्क्रिप्टेड गेम : सुषमा अंधारे जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.बार्शीची युती ही आमची युती नाही.भाजप 'वापरते आणि फेकून देते'धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणापासून ते संजय सिरसाट यांच्यावरील एसआयटी चौकशीपर्यंत एकामागोमाग एक प्रकरणे बाहेर येत आहेत.इम्तियाज जलील प्रकरण-हा स्क्रिप्टेड गेम आहे. मला यावर बोलायचे नाही.निवडणूक बिनविरोध होतात, कारण पैसा बोलतो
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्तेची गणिते जुळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपल्या हक्काच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात' उमेदवारांना झुकते माप दिले आहे. पक्षासाठी वर्षानुवर्षे घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी ऐनवेळी पक्षात आलेल्यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला असून अनेक ठिकाणी बंडाचे निशाण फडकवण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता एक दिवस शिल्लक असताना, या बंडखोरांचे बंड थंड करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून आश्वासनांची खैरात केली जात आहे. मात्र, मनधरणी करण्यात यश आले तरी निवडणुकीच्या मैदानात हे दुखावलेले निष्ठावंत मनापासून पक्षाचे काम करतील का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.या नाराजीमुळे अनेक इच्छुकांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. आता या नाराजांची मनधरणी करण्यात नेत्यांना कितपत यश येते आणि निवडणुकीच्या निकालावर याचे काय परिणाम होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. जिल्हा परिषदेच्या एका गटात सरासरी १० ते १२ गावांचा समावेश असतो. या भागातील दांडगा जनसंपर्क असलेल्या स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. मात्र, विजय मिळवण्याच्या ईर्ष्येपोटी दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवारांना उमेदवारीची माळ घालण्यात आली. पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी या निवडणुका महत्त्वाच्या असतात, तिथेच आमचा बळी दिला जात असेल तर पक्षवाढ कशी होणार?असा संतप्त सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. महानगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसने औसा तालुक्यातील दोन गटात आयातांना संधी दिली आहे. निष्ठावंतांना डावलत आयातांना दिलेल्या उमेदवारीची चांगलीच चर्चा होवू लागली आहे. मातोळा गटातील शालिनी चव्हाण यांना लामजना गटातून उमेदवारी दिली आहे. तर खरोसा गटात मंगरुळ येथील रहिवासी सचिन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नेत्यांच्या मुलांना उमेदवारी दिली जाणार नसल्याचे भाजपने जाहीर केले होते. त्यापूर्वीच आ. रमेश कराड यांचे चिरंजीव ऋषिकेश कराड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या उमेदवारीवरून चर्चा सुरु असतानाच ऋषिकेश कराड यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २७ जानेवारी रोजी ते उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. दुसरा उमेदवार देवून त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू सोळुंके यांना दापका, अंबुलगा गटात तयारी लागण्याचे आदेश देवून डावलले. माजी समाजकल्याण सभापती संजय दोरवे यांना अर्ज भरल्यानंतर ही डावलण्यात आले. अंबुलगा गटातून गुंडेराव जाधव, प्रसाद जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. पक्षातील निष्ठावंतांना डावलून भाजपने धक्कातंत्राचा केलेला वापर कोणाला धक्का देणारा ठरतो हे येणारा काळच सांगणार आहे. निलंग्यात भाजपचे धक्कातंत्र निष्ठावंतांना डावलून इतरांना उमेदवारी दिल्याचा क्रम उदगीर तालुक्यातही भाजपने कायम ठेवला. भाजपमधील सात निष्ठावंतांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान मनधरणी करण्यात कितपत यश येईल हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे. दरम्यान वेगवेगळ्या माध्यमातून या उमेदवारांचे बंड क्षमविण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात उमटत आहे.
अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणूक:आरक्षणाच्या मुद्द्यावर पेच, इच्छुकांचा उत्साह मावळला
अहिल्यानगर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गट व गणरचना तसेच आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. परंतू, आरक्षणाच्या मुद्द्यावर पेच निर्माण झाला. त्यामुळे निवडणुकांचा बिगूल अद्याप वाजलेला नाही. त्यामुळे महिनाभरापूर्वी ज्या जोशात, इच्छुकांनी तयारी सुरू केली होती, त्यांचा उत्साह आता मावळलेला दिसतो आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक होईल, असा तर्क लावला जात आहे. परंतू, घोषणा झाल्यानंतरच अधिकृत तारीख जाहीर होईल. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत २१ जानेवारी रोजीही अंतिम निर्णय स्पष्ट नाही. ज्या जिल्ह्यांत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यावर गेली, त्याबाबतचा निकाल या सुनावणीत अपेक्षित होता. मात्र, अद्याप स्पष्ट झाले नाही. १२ जानेवारीच्या सुनावणीत आयोगाने १० ते १५ दिवसांची मुदतवाढ मागितली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत निवडणुका पूर्ण करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढवून दिली होती. जिथे पेच नाही तिथे निवडणूक' यावर शिक्कामोर्तब झाला असून, प्रक्रिया सुरू झाली. अकोले व श्रीरामपूर पंचायत समितींमधील आरक्षण ५० टक्क्यांवर जात आहे. यापार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडली आहे. जगन्नाथ भोर, निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती निवडणूक का महत्त्वाची आहे? जि.प.बरोबर पंचायत समिती निवडणूक होणे आवश्यक आहे. कारण पंचायत समिती ही जिल्हा परिषदेचेच एक अंग आहे. इतर समित्यांप्रमाणे, पंचायत समित्याही जिल्हा परिषदेचाच भाग आहेत. त्यामुळे दोन पंचायत समित्या डावलून, जेथे अडचण नाही तेथे निवडणुका घेता येणार नाहीत. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमानुसार पंचायत समिती सभापती हे, जिल्हा परिषद सभागृहाचेही सदस्यही आहेत. निवड प्रक्रिया वेगळी आहे. निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी यापूर्वी दोनदा गटरचना झाली, त्यात गट वाढले नंतर कमी झाले. पुन्हा आरक्षण, गटरचना झाली. आता निवडणुका होतील अशी अपेक्षा होती. परंतू आरक्षणाचा पेच निर्माण झाल्यामुळे अद्याप निवडणुका जाहीर नाही. सुरूवातील उमेदवार उत्साहात होते. परंतू, निवडणुका केंव्हा लागतील, याचाच अंदाज लागत नसल्याने इच्छूकांचाही उत्साह मावळला आहे. निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात. - संदेश कार्ले, माजी जि.प. सदस्य.
शेवग्याच्या शेंगाचे किरकोळ बाजारातील दर २८० प्रति किलो झाले आहेत. हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. यापूर्वी इतका कधीच वाढला नव्हता. बाजारात शेवग्याच्या शेंगा भाव खात आहेत. मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने दर वाढल्याचे बोलले जाते. बाजारात फारच कमी आवक होत असल्याने दर गगनाला भिडले आहेत. २८० रूपये प्रति किलोचा दर सर्वसामान्य, गोरगरीबांच्या खिशाला परवडणारा नाही. शेतकऱ्यांना मात्र, दिलासा मिळत आहे.
जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाचा आदेश:खड्ड्यांमुळे अपघातात जखमी, मयत झाल्यास मिळणार नुकसान भरपाई
अहिल्यानगर शहरातील महापालिकेने विकसित केलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन जखमी अथवा मृत्यू झाल्यास मयताच्या नातेवाईकांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे. उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर देण्यात आलेल्या आदेशानुसार यासाठी महापालिकेत समिती गठीत करण्यात आली असून अशा प्रकरणाबाबत अर्ज दाखल करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. उच्च न्यायालयातील जनहित याचिकेवर १३ ऑक्टोबर रोजी देण्यात आलेल्या आदेशानुसार मनपा हद्दीतील मनपाच्या रस्त्यांवर झालेल्या अपघातांबाबत नुकसान भरपाई देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत आयुक्त यशवंत डांगे यांनी माहिती देऊन महानगरपालिका हद्दीतील महानगरपालिकेमार्फत विकसित केलेल्या रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघातात कोणी जखमी झाल्यास त्यांना अथवा अपघातामुळे एखाद्यास जीव गमवावा लागल्यास त्यांच्या नातेवाईकांनी महापालिकेत पुराव्याशी अर्ज सादर करावा, असे म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत त्या अर्जावर योग्य कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. महामार्गावरील अपघात घटनेबाबत स्पष्टोक्ती नाही शहरातील महापालिकांच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनांची संख्या नगण्य आहे. मात्र, महापालिक हद्दीतून जाणाऱ्या महामार्गांवर सातत्याने अपघात होतात. त्यात खड्ड्यांमुळे होणारे अपघातही अधिक आहेत. मात्र, त्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही स्पष्टोक्ती करण्यात आलेली नाही.
रघुवीर खेडकरांचा सन्मान हा तमाशा कलेचाच गौरव : मंत्री राधाकृष्ण विखे
अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र व तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा यंदाच्या पद्म पुरस्काराने झालेला सन्मान महाराष्ट्राच्या ग्रामीण कलेचा गौरव असून तमाशा कलेचा नावलौकिक झाला असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली. रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री विखे यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. खेडकर परिवाराचे मोठे योगदान तमाशा कलेसाठी आहे. ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर यांच्याकडून मिळालेला कलेचा समृद्ध वारसा रघुवीर खेडकर यांनी यशस्वीपणे पुढे नेला. आव्हानात्मक परिस्थितीत तमाशा कलेला जिवंत ठेवण्यासाठी समर्पित भावनेने दिलेल्या योगदानाचा गौरव केंद्र सरकारने पद्म पुरस्कार देऊन केल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा पहिला राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार प्रवरा परिवाराने स्व. कांताबाई सातारकर यांना देऊन सन्मानित केल्याची आठवण मंत्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितली.
नगरसेवक मानधन, इंधनावर वार्षिक पावणेदोन कोटी खर्च:पदाधिकाऱ्यांच्या नव्या कारसाठी रु. 60 लाख मोजणार
महापालिकेत गेली तीन वर्षे असलेले प्रशासकीय राज आता संपुष्टात आले आहे. १०२ नगरसेवक निवडून आल्याने आता प्रशासन सभागृहातील निर्णयानुसार काम करणार आहे. त्यासाठी नगरसेवकांना मानधन, इंधन, चहापान, त्यांचे दौरे यावर खर्च होईल. त्याचा प्राथमिक आकडा दरवर्षी पावणेदोन कोटीचा आहे. नव्या पदाधिकाऱ्यांसाठी यंदा नवीन वाहने घेण्याचा घाटही घालण्यात आला आहे. त्यावर ५० ते ६० लाख रुपये खर्चाचा अंदाज आहे. मार्च २०२२ मध्ये सभागृहाची मुदत संपली. त्यानंतर तीन वर्षे निवडणूकच झाली नाही. त्यामुळे प्रशासनकडून कामकाज सुरू होते. त्यामुळे नगरसेवकांवरील खर्च वाचला होता. गेल्या ३ वर्षात सुमारे १५ कोटी रुपयांची बचत झाल्याचा अंदाज आहे. परंतु लोकशाही पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्था चालवण्यासाठी त्याचा खर्च अपेक्षितच आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, पक्षनेता, विरोधी पक्षनेते यांच्या दिमतीला महापालिकेच्या खर्चातून यंत्रणाही उभी करावी लागते. त्यांचे मानधन, चहापान, इंधन, स्टेशनरी आदींचा वार्षिक खर्च १ कोटी ७० लाख ४० हजार रुपये होईल. महापौर निवडीच्या पहिल्या सभेत सर्व १०२ नगरसेवक येतील. या दिवसापासूनच प्रशासनाच्या खर्चाला सुरुवात होणार आहे. महिन्यातून एकदा सर्वसाधारण सभा, आठवड्यातून एकदा स्थायी समिती, स्थापत्य, महिला व बालकल्याण या समित्यांच्या बैठकांसह इतर बैठकांवर चहापानाचा खर्च करावा लागतो.
शिर्डी नगरपालिकेने केंद्र व राज्यसरकारकडून मिळालेल्याअनुदानासह विविध पुरस्कारांच्यारकमेचा काटेकोर व दूरदृष्टीपूर्णवापर करत ग्रीन एनर्जीच्यामाध्यमातून देशपातळीवर आदर्शनिर्माण केला आहे. सौरऊर्जाप्रकल्पांच्या यशस्वीअंमलबजावणीमुळे शिर्डीनगरपालिका आज ५० टक्केवीजबिलात बचत करणारी आणिऊर्जा स्वयंपूर्णतेकडे झपाट्यानेवाटचाल करणारी एकमेवनगरपालिका ठरली आहे. शहरातील विविध ठिकाणीनगरपालिकेच्या जागेवर एकूण १५ग्रीन एनर्जी प्रकल्प उभारून १.५३ मेगावॅट क्षमतेची सौरऊर्जा निर्मितीसुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठी एकूण ७ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. या माध्यमातून दरमहा सुमारे १ लाख २८ हजार १५० युनिट वीज निर्मिती होत आहे. मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या प्रशासकीय काळात “स्वच्छ व सुंदर शिर्डी” हे स्वप्न साकारल्यानंतरपुढील टप्प्यात ग्रीन एनर्जीवर भरदेण्यात आला. माझी वसुंधराबक्षीसाच्या रकमेतून शहरातील ११ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यातआले. याच बक्षीसातून १ कोटी ७८लाख रुपये खर्च करून भुयारी गटारपंप हाऊस येथे ग्रीन एनर्जी प्रकल्पसाकारण्यात आला. तसेच स्वच्छभारत अभियान अंतर्गत मिळालेल्याबक्षीसातील ५८ लाख रुपयांतूनहीऊर्जा प्रकल्पांची उभारणी केली. केंद्र व राज्य सरकारच्याअनुदानातून अमृत पाणीपुरवठायोजना अंतर्गत १ कोटी ७९ लाखरुपये खर्च करून पाणीपुरवठा प्रकल्पपूर्ण करण्यात आला. याशिवायअमृत अभियानाच्या अनुदानातूनसांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी १कोटी ८२ लाखांची गुंतवणूककरण्यात आली. सौर प्रकल्प सुरू होण्यापूर्वी,म्हणजे ऑगस्ट २०२३ पूर्वी, शिर्डी नगरपालिकेला दरमहा सुमारे १९लाख २५ हजार रुपये वीजबिल भरावे लागत होते. सौरऊर्जा प्रकल्पकार्यान्वित झाल्यानंतर हे बिल ५० टक्क्यांनी घटून सुमारे ९ लाख ९०हजार रुपयांवर आले आहे. यामुळे दरमहा सुमारे ९ लाख ३५ हजाररुपयांची बचत होत आहे. ऑगस्ट२०२३ ते डिसेंबर २०२५ या दोन वर्षेतीन महिन्यांच्या कालावधीत एकूण १ कोटी ४७ लाख ५० हजार रुपयांचीमोठी आर्थिक बचत साध्य झालीआहे. नगरपालिकेला मिळालेल्याबक्षीस व अनुदानाच्या रकमेतून ग्रीनएनर्जी प्रकल्प उभारून ऊर्जा निर्मितीकरणारी शिर्डी नगरपालिका आजदेशातील नगरपालिकांच्या पातळीवर अव्वल ठरली आहे. शिर्डी पालिकेची ग्रीनएनर्जी आकडेवारी
ड्रग रॅकेटचे पारनेर केंद्र झालेअसून, या प्रकरणात थेट स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारीच सहभागी आहे, असा आरोप पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी करतानाच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटनांना आवर घालण्याचे निर्देश त्यांनी दिले. सिस्पे’ प्रकरणाची लवकरच सीबीआय चौकशी सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, वाळू तस्करावर मोठ्याप्रमाणात कारवाया सुरू आहेत. संगमनेर, श्रीरामपूरमध्ये या कारवायामुळे हा उपसा कमी झाला. मात्र जिल्ह्याच्या अन्य ठिकाणी अशा प्रकारे वाळू तस्करी सुरू आहे. अवैध धंदे बंद झाले पाहिजेत. डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून दोन हजार कोटीच्या गुंतवणुकीतून दहा ते पंधरा हजार जणांना रोजगार उपलब्ध होणारआहे असे त्यांनी यावेळी सांगितले. ज्ञानेश्वर सृष्टी संदर्भात बोलतानाते म्हणाले की, प्रवरा नदीवरआपण पूल व एक घाटही बांधतोआहे. त्यासाठी नव्याने एकआराखडा तयार केला जाणारआहे. नगर-मनमाडचे कामपुढच्या दीड वर्षात पूर्ण होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान ते पुढे म्हणाले जिल्हावार्षिक योजना (सर्वसाधारणअनुसूचित जाती व आदिवासीउपयोजना) २०२५-२६ अंतर्गतअहिल्यानगर जिल्ह्यासाठी १ हजार२७ कोटी ३१ लाखांचे नियतव्ययमंजूर असून, ८०१ कोटी ३७ रुपयेकिंमतीच्या प्रशासकीय कामांनामंजुरी देण्यात आली आहे. यंदाआर्थिक वर्षात जिल्हा नियोजनसमितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे विविध योजनांसाठी२५४ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. जिल्ह्यातील महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत यांच्याकडील योजनासाठी ७६ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. यावेळीआमदार काशिनाथ दाते, अमोलखताळ, मोनिका राजळे,आशितोष काळे, विठ्ठल लंघे,जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीअधिकारी आनंद भंडारी आदींचीउपस्थिती होती. धर्मवीर गडावर ५ कोटीतून शौर्यस्तंभ उभारणार श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथीलधर्मवीर गडावर ५ कोटीतून शौर्यस्तंभउभारणार, अहिल्यानगरच्या पासपोर्टकार्यालयाच्या नूतनीकरणासाठी १ कोटीरुपयांचा निधी देण्यात आला. जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनाचे ५लाखांचे अनुदान वाढवून थेट १ कोटीकरण्यात आले. अकोले तालुक्यातीलधुमाळवाडी येथील श्री. सोमेश्वर महादेवमंदिर देवस्थान, संगमनेर तालुक्यातीलधांदरफळ बु. येथील श्री. विठोबा देवमंदिर देवस्थान व खळी येथील श्री.खंडोबा मंदिर देवस्थान, तसेच कोपरगावतालुक्यातील देर्डे चांदवड येथील श्री.मारूती मंदिर देवस्थान अशा एकूण चारग्रामीण तीर्थक्षेत्रांना क'' वर्ग तीर्थक्षेत्राचादर्जा देण्यात आला. बैठक सुरू होण्यापूर्वीच सभापती शिंदे पडले बाहेर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठीविधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे,पालकमंत्री विखे हे जिल्हाधिकारी यांच्यादालनातून सभागृहात एकत्र गेले. बैठक पूर्णहोण्यापूर्वीच प्रा. राम शिंदे बाहेर पडले.त्यानंतर ते विखे यांच्या आयोजित पत्रकारपरिषदेसाठी उपस्थित पत्रकारांना भेटण्यासाठीआले. पत्रकारांनी बोलण्याचा आग्रह धरला.पण आपली बोलायची इच्छा नाही, असे तेम्हणाले. विखे यांनीही नाराजीचा काही विषयनसल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले. काचेची घरे असणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड फेकू नये'' राजकारणात मुद्दे संपले की, फोटो बाहेर काढायचे, बदनामीचा धुरळा उडवायचा आणि खोट्या प्रचारावर निवडणूक जिंकायची हा प्रकार आता उघडपणे सुरू आहे. मात्र,ज्यांची घरे काचेची आहेत त्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नयेत'' अशा शब्दांत खासदार नीलेश लंके यांनी माजी खासदारसुजय विखे यांना जाहीर इशारा दिला. आरोपांना लंके यांनी थेट आव्हान दिले. एकाफोटोवरून नाते जोडणे म्हणजे बालिशपणा असल्याचे ते म्हणाले.
शनिवार, रविवार आणि सोमवारी आलेलीप्रजासत्ताक दिनाची सुट्टी अशा सलगसुट्ट्यांचे निमित्त साधून, देश-विदेशातीललाखो भाविकांनी शिर्डी, शनिशिंगणापूरयेथे मोठी गर्दी केली. शनिशिंगणापुरातप्रशासक डॉ. प्रवीण गेडाम यांच्या कडकशिस्तीमुळे वर्षानुवर्षांचा ''लटकू'' आणिबेशिस्त वाहतुकीचा त्रास संपुष्टातआल्याने, भाविकांनी यंदा समाधान व्यक्त केले. देशाच्या तसेच राज्याच्या विविधभागांतून लाखो भाविक साईबाबांच्यादर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले असून,संपूर्ण शिर्डीनगरी भाविकांच्या गर्दीने फुलूनगेले. शनिवार व रविवार या अवघ्या दोनदिवसांत सुमारे दोन लाख भाविकांनी श्रीसाईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.पहाटेपासूनच समाधी मंदिरात दर्शन रांगालागल्या होत्या. गर्दी वाढत असतानाही साईसंस्थान प्रशासनाच्या नियोजनबद्धव्यवस्थेमुळे भाविकांना एक ते दीड तासांतसुकर व समाधानकारक दर्शन मिळाले.साईसंस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर,डेप्युटी सीईओ दराडे दर्शन रांगेत भाविकांनामदतकार्यात सहभागी झाले. विशेष म्हणजे,एवढ्या मोठ्या गर्दीतही कोणताही गोंधळ नहोता साईसमाधीचे दर्शन शांततेत वशिस्तबद्ध पद्धतीने होत असल्यानेभाविकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसूनआले. इतक्या गर्दीतही अवघ्या एक ते दीडतासांत दर्शन मिळाले. व्यवस्था अतिशयउत्तम आहे,” अशा प्रतिक्रिया अनेकभाविकांनी व्यक्त केल्या. २६ जानेवारीच्यासुट्टीमुळे सोमवारीही शिर्डीत भाविकांचीसंख्या वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळपासूनच शिंगणापूरभाविकांच्या गर्दीने फुलून गेले. दोनदिवसांत अंदाजे २ लाखांहून अधिकभाविकांनी चौथऱ्यावर नतमस्तक होऊनदर्शन घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे.वाढती गर्दी लक्षात घेता, देवस्थानचेकार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे आणिसहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळकेयांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्तठेवण्यात आला आहे. भाविकांकडून नव्याबदलांचे स्वागत देवस्थान प्रशासनानेभाविकांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी पार्किंगपूर्णपणे मोफत केली आहे. तसेच पूजा साहित्याचे दर कमी केल्याने सर्वसामान्यभाविकांना मोठा दिलासामिळाला आहे. या बदलांमुळेशिंगणापुरात खऱ्या अर्थानेपारदर्शकता आली आहे,अशी प्रतिक्रिया परराज्यातूनआलेल्या भाविकांनी दिली. देवस्थानला शिस्तलागली : आमदार लंघे गर्दीच्या पार्श्वभूमीवर आमदार लंघे यांनी देवस्थानचा आढावा घेतला. प्रशासक डॉ. गेडाम यांच्या खमक्याभूमिकेमुळे देवस्थानला शिस्तलागली आहे, आम्ही त्यांच्याकारभारात कोणताही राजकीयहस्तक्षेप करणार नाही, अशी ग्वाहीत्यांनी यावेळी दिली. तसेच,वारकरी संप्रदाय, संत-महंत आणिमोठ्या देणगीदारांसाठी स्वतंत्र वविशेष व्यवस्था असावी, यासाठीआपण प्रशासनाला पत्र देणारअसल्याचे त्यांनी नमूद केले.
सॉफ्टवेअर बदलाचा फटका:विवाह प्रमाणपत्रावर बारकोड अनिवार्य, आधी नोंदणी केलेल्यांना हजाराचा भुर्दंड
सप्टेंबर २०२५ पूर्वी विवाह नोंदणी केलेल्या नागरिकांसमोर आता एक नवे तांत्रिक संकट उभे आहे. आधार कार्ड नूतनीकरणासह विविध शासकीय कामांसाठी आता विवाह प्रमाणपत्रावर बारकोड अनिवार्य असल्याचे सांगितले जाते. मात्र जुन्या प्रमाणपत्रांवर ही सुविधा नसल्याने नोंदणीच्या किचकट प्रक्रियेतून जावे लागते. हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागतो आहे. जळगाव मनपा विवाह नोंदणी कार्यालय येथे दररोज १० ते १५ नागरिक बारकोड असलेल्या नवीन प्रमाणपत्रासाठी अर्ज करत आहेत. महिन्याला ८०० ते ९०० अर्ज दाखल होत आहेत. नोंदणी कार्यालयात एकच कर्मचारी असल्याने नवीन प्रमाणपत्रासाठी तब्बल तीन महिने लागताहेत. कलेक्टर कार्यालयातील दुय्यम निबंधक कार्यालयात अशा अर्जाची संख्या शून्य आहे. असे आहेत बारकोड आणि क्यूआर कोडचे फायदे करून मिळते बारकोडचे प्रमाणफत्र अर्जाची तपासणी विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर बारकोड नसेल त्यांनी सर्व कागदपत्रांसह जुने विवाह नोंदणी प्रमाणपत्र (महापालिकेत यापूर्वी नोंदणी केली असेल तरच किंवा ज्या कार्यालयाकडून विवाह नोंदणीचे प्रमाणापत्र घेतले असेल त्या कार्यालयात) अर्ज जमा करावे. आलेल्या अर्जाची तपासणी करून बारकोड असलेले प्रमाणपत्र त्या त्या कार्यालयातर्फे देण्यात येते. यासाठी साधारणपणे एक ते दीड महिना लागतो; मात्र एखाद्या ठिकाणी बारकोड नसलेले विवाह प्रमाणपत्र नसल्याने जर कोणी अडवणूक करत असेल तर त्याची तक्रार विवाह नोंदणी अधिकारी यांच्याकडे करावी. पुन्हा नव्याने नोंदणी करावी लागेल बारकोड नसलेल्या प्रमाणपत्रावर बारकोड मिळवण्यासाठी नव्याने नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी निर्धारित शुल्क भरावे लागेल. यानुसार नवीन रेकॉर्ड तयार होईल. महापालिकेत यापूर्वी जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणि बारकोडसाठीचा अर्ज द्यावा लागणार आहे. -डॉ. मनीषा उगले, विवाह नोंदणी अधिकारी, मनपा सॉफ्टवेअर बदलामुळे बारकोड बारकोडबाबत स्वतंत्र शासन आदेश नाही; मात्र सॉफ्टवेअर बदलल्यामुळे आता बारकोडची सुविधा आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही बारकोडयुक्त प्रमाणपत्रे देत आहोत. जुनी प्रमाणपत्रेही ग्राह्य धरली जावीत. बारकोडसाठी अडवणूक करू नये. -जी. पी. राठोड, विवाह नोंदणी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
जळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्यामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्याबसस्थानकाचा आणि आगाराचा चेहरामोहराबदलणार आहे. सुमारे ६० वर्षांपूर्वीचे जुनेबांधकाम हटवून त्या ठिकाणी ४० कोटी रुपयेखर्च करून भव्य आणि अद्ययावतबसस्थानक, आगार आणि विभागीय कार्यालयउभारण्याचा प्रस्ताव जळगाव विभागानेमध्यवर्ती कार्यालयाकडे पाठवला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीयासाठी विशेष पुढाकार घेतला असून, परिवहनमंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे. नवीनबसस्थानकाची सध्याची इमारत १९६४-६५मधील असून, आगाराचे बांधकाम १९५३-५४मध्ये झालेले आहे. या इमारतींचे आयुर्मानसंपले आहे. अलीकडेच झालेल्या स्ट्रक्चरलऑडिटमध्ये विभागीय कार्यालयाची इमारततातडीने खाली करण्याच्या सूचना देण्यातआल्या आहेत. प्रवाशांची वाढती संख्या आणिअपुऱ्या सुविधा लक्षात घेता, या संपूर्णपरिसराची पुनर्बांधणी करणे अनिवार्य झालेआहे. विभागीय नियंत्रक यांनी या कामाचेसविस्तर अंदाजपत्रक तयार केले आहे. असा असेल नवा प्रकल्प १ . सध्याच्या १६ फलाटांऐवजी आता२४ फलाटांचे प्रशस्त बसस्थानकउभारले जाईल. तळमजला व पहिल्यामजल्यावर प्रशासकीय कार्यालये,वाणिज्य गाळे, पास रूम, उपाहारगृह वप्रवाशांसाठी प्रसाधनगृहे असतील. २. आगारातील संपूर्ण वाहनतळाचेकाँक्रिटीकरण होईल. अधिकारी आणिकर्मचाऱ्यांसाठी नवीन निवासस्थाने वविश्रांतीगृहे बांधली जातील. नवीनइमारतीत फायर फायटिंग सिस्टिम,सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. परिवहन मंत्र्यांना गुलाबरावांचे पत्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी परिवहन मंत्री प्रतापसरनाईक यांना पत्र लिहून या कामासाठी तातडीनेनिधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.५०-६० वर्षांपूर्वीचे हे बांधकाम जीर्ण असून, प्रवाशांचीमोठी गैरसोय होत आहे. जळगावच्या वैभवात भरघालणारे हे नवीन बसस्थानक व्हावे, ही आमचीप्राथमिकता आहे, असे पालकमंत्र्यांनी नमूद केले आहे. मुंबई कार्यालयाला प्रस्ताव बसस्थानकाची इमारती फार जुनीझाली आहे. पंधरा दिवसांपूर्वीबसस्थानकाचा कायापालट करण्यासाठीमुंबई कार्यालयाला प्रस्ताव सादरकरण्यात आला आहे. शासनाचा निधीमिळाला तर लवकर काम सुरू होईल. - दिलीप बंजारा, विभाग नियंत्रक
नाशिक महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच शांतारामबापू वावरे यांच्या रुपाने नाशिककला महापौरपद मिळाले. तेव्हापासून ते आजतागायत ३४ वर्षांच्या कार्यकाळात सिडको विभागाला एकदाही महापौर पद मिळालेले नाही. याउलट पूर्व विभागास तब्बल ७ वेळा तर पंचवटी विभागास ५ वेळा महापौरपद मिळालेले आहे. याशिवाय पश्चिम नाशिक, सातपूर व नाशिकरोड विभागाला प्रत्येकी एक वेळा महापौरपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे यंदा सिडकोतील महिलेली महापौरपदी निवड व्हावी अशी अपेक्षा सिडकोवासीयांना लागलेली आहे. महापौरपदाच्या आरक्षण सोडतीत सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. पालिका निवडणुकीत भाजपला ७२ जागा जिंकल्याने स्पष्ट बहुमत मिळाल्याने याच पक्षाचा महापौर होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे इच्छुकांनी लॉबिंग सुरु केलेले आहे. विशेष म्हणजे, नाशिक पश्चिम मतदारसंघात म्हणजेच सिडको-सातपूर विभागात २०१७ च्या निवडणुकीत भाजपचा आकडा ४७ पैकी २२ नगरसेवक होता, परंतु यंदाच्या निवडणुकीत ही संख्या ४७ पैकी ३० वर पोहचली असल्याने सिडकोकडे हे पद आले पाहिजे, अशी मागणी आमदार सीमा हिरे यांनी केली आहे. असे आहेत विभागनिहाय महापौरपद भूषवलेले नावे पूर्व : स्व. शांताराम वावरे, स्व. पंडितराव खैरे, वसंत गिते, अशोक दिवे, विनायक पांडे, यतीन वाघ, सतीश कुलकर्णी. पंचवटी : स्व. उत्तमराव ढिकले, डॉ. शोभा बच्छाव, बाळासाहेब सानप, अशोक मुर्तडक, रंजना भानसी सातपूर : दशरथ पाटील पश्चिम : प्रकाश मते नाशिकरोड : नयना घोलप महाजन यांच्याकडे फिल्डिंग महापौर पदासाठी भाजपकडून अंतिमत: तीन ते चारच महिलांची नावांमध्ये स्पर्धा अाहे. ३० जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया होणार आहे. तत्पूर्वी इच्छुकांचे समर्थक मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे लॉबिग केले जात आहे. त्यांचाच शब्द अंतिम असल्याने काही मुंबईत तर काही इच्छुकांनी थेट जामनेर गाठल्याची चर्चा आहे. तर प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनासाठी महाजन नाशकात येणार असल्याने इच्छुक हे भेट घेण्यासाठी फिल्डिंगमध्ये आहेत.
सांगली जिल्ह्यातील मिरजजवळील खेड्यातून प्रवास सुरू केलेला हॉटेलमधील वेटर आज आपल्या कलोपासनेमुळे सातासमुद्रापार पोहोचला आहे. त्यांची वेटर ते गिनीज बूकपर्यंतची झेप प्रेरणादायी आहे. चंद्रकांत बडीगेर यांनी कॅलिग्राफीच्या कलेतून केवळ आपले आयुष्य बदलले नाही, तर हजारो लोकांची मने जिंकली आहेत. नावातून गणपती साकारण्याची त्यांची कला आज त्यांच्या यशाची ओळख ठरली आहे. नाशिकमध्ये आयोजित तान महोत्सवात ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर समोर आलेला त्यांचा हा प्रवास. चंद्रकांत बडीगेर यांचे आयुष्य सुरुवातीला अत्यंत संघर्षमय होते. उदरनिर्वाहासाठी त्यांनी काही काळ हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले. मात्र, आर्थिक अडचण अन् परिस्थिती बेताची असताना त्यांना कलेचा नवा मार्ग सापडला. १७ जुलै २०१३ पासून ते कॅलिग्राफी कला जोपासत आहे. त्यांनी सांगलीतील मारुती चौकात पहिला स्टॉल उभारला. त्या दिवशी त्यांनी ‘चंद्रशेखर’ हे पहिले नावाचे गणपती काढले आणि तेथून त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. २०२४ मध्ये त्यांच्या या अनोख्या कलेची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. गावातून सुरू झालेला प्रवास पोहचला परदेशात लहान स्टॉलपासून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू राज्यभर पोहोचला. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, गणेशोत्सव, हळदी-कुंकू समारंभात त्यांच्या कलेला मोठी मागणी निर्माण झाली. लोकांच्या पसंतीमुळे त्यांनी पंधरा हजार रुपयांचे कर्ज फेडले आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम जीवन उभे केले. आज भारतातील विविध राज्यांसह परदेशातूनही त्यांना या कलेसाठी आमंत्रण येत असल्याचे ते सांगतात. ३० सेकंदांत नावात साकारतात गणपती बाप्पा नाममात्र शुल्क घेत ३० सेकंदांत पांढऱ्या कार्डशिटवर बडीगेर हे नावाचा गणपती काढून देणे हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य आहे. नाशिकमध्ये तान महोत्सवात पहिल्याच दिवशी १५ हजार नाशिककरांनी त्यांच्याकडून नावाचे गणपती काढून घेतले. त्यांच्या स्टॉलवरील गर्दी त्यांच्या कलेची पावती दर्शवणारी ठरली. पत्नी-मुले याच क्षेत्रात कार्यरत, कपल नेमही बडीगेर यांनी ही कला पत्नी व दोन्ही मुलांनाही शिकवली आहे. त्यांचा मुलगा तब्बल १२ भाषांमध्ये नावाचा गणपती काढतो, तसेच ‘कपल नेम’ गणपती साकारण्यातही निपुण आहे. संपूर्ण कुटुंब कॅलिग्राफी क्षेत्रात कार्यरत आहे.
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मुंबईच्या दिशेने निघालेला विराट मोर्चा रविवारी (दि. २५) नाशिक शहरात घडकला. २० हजारांहून अधिक आदिवासी बांधवांचा हा जनसागर शहरात दाखल होताच ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीचा फटका मोर्चा तब्बल तीन तासापर्यंत वाहनधारकांना बसला. सकाळी ९ वाजता दिंडोरी रोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरापासून मोर्चाला प्रारंभ झाला. दुपारी ४ वाजता मोर्चा महामार्गावरून विल्होळीच्या दिशेने निघाल्यांनतर वाहतूक सुरळीत झाली. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या हजारो पर्यटकांनाही विस्कळीत झालेल्या वाहतूकीमुळे पर्यायी मागाँचा शोध घेत मनस्ताप सहन करावा लागला. ठिकठिकाणी वाहने अडकून पडली २६ जानेवारीच्या निमित्ताने आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे नाशिक, त्र्यंबक आणि शिर्डीकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची गर्दी झाली होती. त्यातच शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या या मोर्चामुळे त्र्यंबकरोड, शालीमार चौक, एमजी रोड, अशोकस्तंभ, सीबीएसच्या चारही बाजूला रिक्षा, बसेस व पर्यटकांची वाहने अडकल्याने कोंडी झाली. मुंबईनाका परिसरातून मोर्चा पुढे जाताना पुन्हा भाभानगर, द्वारका, इंदिरानगरकडून महामार्ग थानकाकडे येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या. अशीच स्थिती गोविंदनगर बोगद्याकडून लेखानगर, पाथर्डी फाट्याकडे समांतर स्त्यावरून जाताना वाहने अडकून पडले होते. या भागात वाहतूक कोंडी निमाणीवरून पंचवटी कारंजा, होळकर पुलावरून रविवार कारंजा भागातून मेहेर सिग्नलवरून जिल्हाधत्रकारी कार्यालयासमोर मोर्चा येवून थांबला. तोपर्यंत पंचवटी ते आरके भागात वाहतूक कांडी झाली होती. मोर्चाच्या मार्गावर पोलिसांचा फौजफाटा अशोक स्तंभ, जिल्हाधिकारी कार्यालय आणि सीबीएस परिसरात पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहतूक वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंतर्गत गल्ल्यांमध्येही वाहने अडकल्याने सर्वत्र ट्रॅफिक जॅम ची स्थिती निर्माण झाली होती. या मोर्चाच्या मार्गावर सुट्टीच्या दिवशीही ४० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले. - संदीप मिटके, सहायक आयुक्त
नागरिकांना नियमित पाणी पुरवठा व्हावा, यासाठी पालिकेने उभारलेल्या एक्स्प्रेस फीडरवर विद्युत वितरण कंपनीने परस्पर कब्जा केला, असा आरोप स्वीकृत नगरसेवक संतोष कोल्हे यांनी केला आहे. कोल्हे म्हणाले की, शहरातील नागरिकांना सध्या सहा ते आठव्या दिवशी पाणी पुरवठा होत आहे. त्यात विखंडित विद्युत पुरवठा हेही प्रमुख कारण आहे. २०११ या वर्षी अखंडित वीजपुरवठा व्हावा म्हणून तत्कालीन मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे यांनी पालिकेच्या वतीने एक्स्प्रेस फीडर उभे केले. त्यासाठी तेरा लाख रुपयेनिधी खर्च झाला. या फीडरमुळे पाणीपुरवठ्यासाठी अखंडित वीज उपलब्ध झाली. मात्र सध्या जलशुद्धीकरण प्रकल्पावरील विद्युत पुरवठा पाच ते सहा तास खंडित होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. विद्युत वितरण कंपनीने या एक्स्प्रेसफीडरवर अनधिकृत कब्जा केला आहे.याच फीडरहून विद्युत वितरण कंपनीनेअन्य गाव व ग्राहकांना विद्युत जोडण्यादिल्या आहेत. पालिकेला या फीडरचेसाडेसात लाख रुपये असे मोठे वीज बिलयेत आहे. हा भुर्दंड पालिकेने का सोसावा?या कृत्रिम पाणी टंचाईस विद्युत वितरणकंपनी जबाबदार आहे. पालिकेने विद्युतवितरण कंपनी विरोधात गुन्हा नोंदवावा,अशी मागणीही त्यांनी केली. यावेळीराष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते संतोष निकम,नगरसेवक युवराज बनकर, राहुल अशोकवाघ, रवींद्र राठोड, बंटी काशिनंद, पाणीपुरवठा विभाग प्रमुख बाजीराव थोरातआदींची उपस्थिती होती. विद्युत वितरण कंपनीस पत्रदिले : मुख्याधिकारी लांडे या संदर्भात मुख्याधिकारी रवींद्र लांडेयांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीसांगितले की, मी नव्यानेच पालिकेत रुजूझालो आहे. विद्युत वितरण कंपनीलाकारणे दाखवा नोटीस बजावली आहे.विद्युत अभियंते राहुल कर्डे यांनाचौकशीचे आदेश दिले आहेत. विद्युतवितरण कंपनीस पत्र दिले आहे. पालिकेलाआलेले अतिरिक्त वीज बिल वजावटकरण्यात येईल. पूर्वी अडीच लाख वीजबिल येत होते ते आता सात ते आठ लाखयेत आहे. चौकशी करून पुढील कारवाई करू : अभियंता वाघचौरे याबाबत विद्युत वितरण कार्यकारीअभियंता आर. पी. वाघचौरे यांनीसांगितले की, मी वैजापूर दौऱ्यावरआहे. कनिष्ठ अभियंता राठोड यांनाचौकशीचे आदेश दिले आहेत. ही वीजजोडणी कधी, कोणी व कोणत्याआधारावर दिली याची चौकशी करूनपुढील कारवाई करू व सध्या या जोडण्या तत्काळ डिस्कनेक्ट करण्यातयेतील, असा इशारा त्यांनी दिला.
हनुमान मंदिर चोरीचा 15 तासांतच छडा:2 लाखांचा मुद्देमाल जप्त; 5 आरोपींना 6 दिवसांची पोलिस कोठडी
पदमपुरा परिसरातील १५० वर्षे प्राचीन हनुमान मंदिरातील मूर्तीचे दागिने आणि दानपेटी लंपास करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अवघ्या १५ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्याने तपासात सुरुवातीला अडथळा येत होता, मात्र सायबर पोलिसांनी डिजिटल मल्टिमीडिया फॉरेन्सिक आणि एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने धूसर प्रतिमा स्पष्ट केली. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मोडस ऑपरेंडी ब्युरो रेकॉर्डवरील ५ सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून २.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमजद खान सलीम खान (२८, रा. जलाल कॉलनी) टोळीप्रमुख व रेकॉर्डवरील गुन्हेगार, शेख शोएब शेख बाबा (३०, रा. अलहिलाल कॉलनी), शेख समीर शेख सलीम (२३, रा. कटकट गेट), शेख आमेर शेख नब्बू (२९, रा. रोजाबाग), इम्रान खान ऊर्फ इम्मा युनूस खान (२२, रा. कटकट गेट) अशी या आरोपींची नावे आहेत. पोहे खाल्ले आणि मंदिरात घुसले तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२३ जानेवारी) मध्यरात्री ही टोळी रेल्वेस्टेशन परिसरात पोहे खाण्यासाठी एकत्र आली होती. तेथून त्यांनी चोरीचा बेत आखला आणि पदमपुरा येथील हनुमान मंदिर गाठले. अवघ्या ३० मिनिटांत दोघांनी मंदिरातील मूर्तीवरील सोन्याचा टिळा, चांदीच्या भुवया, डोळे, पायथ्याचे कडे आणि त्रिशूळ असा मौल्यवान ऐवज लंपास केला. या वेळी टोळीतील इतर तिघे बाहेर दुचाकीवर पाळत ठेवून उभे होते. गुन्ह्याचा डिजिटल उलगडा आयुक्त प्रवीण पवार यांनी तपासासाठी ५ पथके तैनात केली होती. पोलिसांनी परिसरातील २० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. अंधारामुळे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. सायबर निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या टीमने एआय सॉफ्टवेअर वापरून प्रतिमा स्पष्ट केल्या. एमओबी डेटाबेसशी त्यांची तुलना केली असता हर्सूलमधील बुद्धमूर्ती चोरी करणारा आरोपी अमजद खान याची ओळख पटली. सैलानीत दर्शनाला गेले अन् हाती बेड्या पडल्या मुख्य आरोपी अमजदला ताब्यात घेतल्यानंतर समजले की, त्याचे साथीदार शेख समीर, शेख आमेर आणि इम्रान खान हे चोरीच्या पैशांवर मौजमजा करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथे दर्शनासाठी गेले आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ बुलढाणा गाठून तिथून त्यांना झडप घालून ताब्यात घेतले. काय आहे एमओबी तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाद्वारे अस्पष्ट किंवा पिक्सेलेटेड झालेल्या सीसीटीव्ही फुटेजला स्पष्ट केले जाते, ज्यामुळे गुन्हेगारांचे चेहरे किंवा शारीरिक खुणा ओळखणे सोपे होते. एमओबी हा पोलिसांचा असा डेटाबेस आहे, ज्यात सराईत गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीची (उदा. मंदिर फोडणे, घरफोडी) आणि त्यांच्या फोटोंची नोंद असते.
‘मी उज्जैनचा नागा साधू आहे. तुमच्याकडचे सोने द्या, त्याचे डबल करून देतो,’ असे म्हणत ज्येष्ठ नागरिकाकडून सोनसाखळी अन् अंगठी घेतली. त्यानंतर ‘५ पावले मागे जा,’ म्हणत चोरट्यांनी कारमधून पलायन केले. हा प्रकार २४ जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास दर्गा परिसरातील पोदार शाळेजवळ घडला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात दोघाविरोधात गुन्हा केला आहे. याप्रकरणी पोलिसांच्या माहितीनुसार, अप्पाराव रामराव बेंबडे (७५, रा. देवानगरी, शहानूरवाडी) हे २४ जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास फिरण्यासाठी गेले होते. काही वेळातच त्यांच्याजवळ आलिशान कार येऊन थांबली. त्यात दोघेजण होते. त्यांच्यापैकी कपडे न घातलेल्या, अंगाला भस्म लावलेल्या व्यक्तीने फिर्यादीला जवळ बोलावून घेतले. ‘मी उज्जैन येथील नागासाधू असून, सोने दुप्पट करून देतो,’ असे सांगितले. साधूने स्वतःकडचे ५०० रुपये आणि एक रुद्राक्ष फिर्यादीला दिला. आणि हे तुमच्या तिजोरीत नेऊन ठेवा, त्यानंतर तुमचे पैसे दुप्पट होतील, असे सांगितले. त्यानंतर साधूने तुमच्याकडे काही सोने असेल तर ते मला काढून द्या, मी त्याचे डबल करून देतो, असे सांगितले. मागे जाण्यास सांगून ठोकली धूम फिर्यादीने दीड तोळ्याची सोन्याची साखळी, एक तोळ्याची सोन्याची अंगठी काढून साधूला दिली. साधूने फिर्यादीला तुम्ही आता ५ पावले मागे जा, असे म्हणाला. फिर्यादी मागे जाताच कारमधून साधूने धूम ठोकली. १५ मिनिटे फिर्यादी नागा साधूची वाट पाहत थांबले, परंतु कार आली नाही. फसवणूक केल्याचे स्पष्ट होताच फिर्यादीने ठाण्यात तक्रार दिली.
छत्रपती संभाजीनगर शहरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या लातूरच्या टोळीला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (२४ जानेवारी) मध्यरात्री महामार्गावर मृत्यूचा थरार अनुभवला. केंब्रिज चौक ते गणेश कॉलनी या १० किलोमीटरच्या अंतरात तस्करांनी पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी दोन वेळा गाडी अंगावर घालत ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हे शाखेचे अंमलदार दादासाहेब झारगड यांनी धावत्या कारच्या बोनेटवर उडी मारून काच फोडली.त्यामुळे कारच्या चालकाला पुढे दिसण्यास अडचण झाली. त्यामुळे गाडीचा वेग मंदावला. आणि पोलिसांच्या गाड्यांना आरोपींच्या गाडीला घेराव घालत १८.७८ लाखांच्या मुद्देमालासह तिघांना बेड्या ठोकल्या. शेख समीर राजसाब (२४, लातूर), सय्यद अल्ताफ वहाब (२३, उदगीर, लातूर), उमर अब्दुल सहाब (३६, लातूर) या तिघांना अटक केली. पदमपुऱ्यातील हनुमान मंदिराच्या तपासकामी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शनिवारी वाहने तपासणीचे आदेश दिले होते. ८९ टक्क्यांचा मानकरी विद्यार्थ्याचा तस्करीपर्यंत प्रवास या प्रकरणातील धक्कादायक खुलासा म्हणजे अटकेतील शेख समीर राजासाब लातूरच्या नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या समीरला १२ वीत ८९ टक्के गुण होते. मात्र, झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी हा गुणवंत विद्यार्थी तस्करीकडे वळला. लातूरच्या मराठवाडा मेडिकलमधून केवळ ४० रुपयांच्या कमिशनसाठी हा माल आणला जात होता. ८० रुपयांची बाटली शहरात ४०० रुपयांना विकण्याचे या टोळीचे नियोजन होते. आयुक्तांचा कॉन-कॉल अन् रिअल टाइम ट्रॅकिंग आरोपींची कार सुसाट धावत असताना पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तातडीने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कॉन्फरन्स कॉलवर घेतले. आरोपींचे लोकेशन आणि ते ज्या दिशेने जात आहेत याची माहिती रिअल टाइममध्ये सर्व पोलिस ठाण्यांना दिली जात होती. यामुळेच शहरातील विविध चौकांत अवघ्या काही मिनिटांत नाकेबंदी लागली आणि पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद झाले. केंब्रिज चौक ते टीव्ही सेंटरपर्यंत केला पाठलाग रात्री ९:२० च्या सुमारास पीएसआय प्रवीण वाघ यांचे पथक केंब्रिज चौकात असताना तवेरा (एमएच-१२ एचएन-९९१७) संशयास्पद वाटली. पोलिसांनी इशारा करूनही गाडी न थांबवली नाही. ही कार ताशी १०० किमीपेक्षा जास्त वेगाने सावंगी बायपास, नारेगाव, बजरंग चौकमार्गे टीव्ही सेंटरकडे झेपावली. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी आयपी मेसजवळील चौकात गाडी आडवी लावून आरोपींचा रस्ता रोखला. पुढे गणेश कॉलनी परिसरात अंमलदार गणेश सागरे यांनी कार रोखण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्यांना धडक दिली. ज्यामध्ये सागरे जखमी झाले.
साधारणतः तीन वर्षांच्या कालावधीनंतर जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर तब्बल आठ वर्षांनंतर या निवडणुका पार पडत आहेत. मधल्या काळात मतदारांसह कार्यकर्त्यांसोबत या नेते मंडळींनी संपर्क न ठेवल्यामुळे आणि निवडणुकांची लगबग सुरू झाल्याने प्रचाराला कार्यकर्ते मिळत नाहीत. त्यामुळे उमेदवारांना आता प्रचारासाठी नातेवाइकांचा गोतावळा जवळ करावा लागत आहे. त्यामुळे सर्वच उमेदवार नातेवाइकांचा शोध घेताना दिसत आहेत. नुकतीच महानगरपालिकेची रणधुमाळी संपली. वरिष्ठ न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जाहीर केली. या निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला आहे. नुकतीच २२ जानेवारी रोजी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. कोणते उमेदवार रिंगणात राहणार हे निश्चित झाले. परंतु या उमेदवारांनी मागील काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुका साधारणतः तीन वर्ष लांबणीवर पडल्यामुळे या निवडणुका नेमक्या कधी होतील याची शाश्वती नसल्याने मतदारांसह आपापल्या कार्यकर्त्यांशी संपर्क न ठेवल्यामुळे सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर दिसत आहे. त्यामुळे गाव दौरे करण्यासाठी उमेदवारासोबत कार्यकर्ते दिसत नाहीत. ऊसतोडीमुळे मतदानाचा टक्का कमी होणार चारठाणा गटासह जिंतूरतालुक्यातील इतरही गटांमध्ये मोठ्याप्रमाणावर तांडे, वाड्या, वस्तीअसल्याने या तांडे, वाड्या,वस्त्यांवरील नागरिक मोठ्याप्रमाणावर ऊस तोडणीसाठी इतरजिल्ह्यांमध्ये स्थलांतरित झाल्यानेमतदानाचा टक्का काही प्रमाणातकमी होण्याची शक्यता वर्तविण्यातयेत आहे. स्थलांतरामुळे मतदारांना शोधण्यासाठी तारांबळ उमेदवारांनी प्रचारासाठी आताआपल्या नातेवाइकांचा गोतावळाजमा करत आहे. त्याचबरोबर यापाहुणे मंडळींना गावांची जबाबदारीहीदिली जात आहे. ग्रामीण भागामध्येमागील आठ वर्षांत खूप मोठाफेरबदल झाला. बरेच मतदारस्थलांतरित झाल्यामुळे आपल्यालामतदारांना शोधण्यासाठी उमेदवारांचीतारांबळ उडत आहे.
श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या भावनेतून भाविक साईबाबांच्या चरणी मनोभावे दान अर्पण करत असतात. अमेरिकेतील साईभक्त अंकिता राजेंद्र पटेल यांनी श्री साईबाबांच्या चरणी ७०० ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला. हा मौल्यवान सुवर्ण मुकुट श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे विधिवत सुपूर्द करण्यात आला. या मुकुटाची किंमत सुमारे १ कोटी १ लाख ३८ हजार १०० रुपये आहे. याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दानशूर साईभक्त अंकिता राजेंद्र पटेल यांचा सत्कार केला व त्यांच्या दानाबद्दल मनःपूर्वक आभार मानले. देशाबाहेर राहूनही साईबाबांप्रति असलेली ही नितांत श्रद्धा आणि भक्ती भाविकांसाठी प्रेरणादायी असल्याचे गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले. देश-विदेशातील साईभक्तांकडून अशा प्रकारे होणारी दाने ही साईबाबांवरील अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे. दरम्यान, सलग सुट्या आल्याने महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक सध्या शिर्डीत दाखल होत असल्याचे सांगण्यात आले आहे. हुंडीतील देणगीव्यतिरिक्त या वर्षातील मोठे दान सध्या सुटीचा काळ सुरू असल्याने शिर्डीत भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. देणगी देणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. नवीन वर्षात रोख, हुंडी आणि वस्तूंची देणगीव्यतिरिक्त सुवर्ण मुकुटाचे दान या वर्षातील मोठे दान आहे. संस्थानचे सेवाभावी कार्य देश-विदेशातील साईभक्तांकडून दरवर्षी श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात सोने, चांदी, विविध वस्तू तसेच हुंडीतून दान प्राप्त होते. भाविकांच्या श्रद्धेतून मिळालेल्या या देणगीचा उपयोग संस्थानकडून समाजोपयोगी व सेवाभावी कार्यांसाठी केला जातो. या निधीतून भाविकांसाठी पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या असून विनामूल्य उपचारासाठी साईबाबा व साईनाथ ही दोन रुग्णालये आहेत.
हिंद-दी-चादर श्री गुरू तेगबहादूर यांनी केवळ शिखांसाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेसाठी बलिदान दिले आहे. धर्माच्या रक्षणासाठी ते लढत राहिले. हा इतिहास वीरता आणि शौर्याचा आहे. हा इतिहास शीख पंथापर्यंत मर्यादित न राहता भारतातील प्रत्येकाला माहीत झाला पाहिजे. यासाठी यापूर्वी नागपूर, नांदेड आणि आता मुंबईत शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. हे सरकार एवढ्यावरच थांबणार नसून नानकलेवा संगतच्या माध्यमातून गुरू तेगबहादूर यांच्या शौर्यगाथेचा इतिहास घराघरात पोहोचवणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. शिखांचे नववे गुरू तेगबहादूरसाहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम सोहळ्यानिमित्त मागील दोन दिवसांपासून मोदी मैदानावर हिंद-दी-चादर कार्यक्रम होत आहे. रविवारी या कार्यक्रमाचा समारोप झाला या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संत बाबा कुलवंतसिंघ, संत बाबा बलविंदरसिंघ, संत बाबा हरनामसिंघ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण तसेच दिल्लीचे उद्योगमंत्री स. मनजिदरसिंघ सिरसा आणि राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री अतुल सावे, मंत्री गिरीश महाजन, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबिरसिंघ आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. फडणवीस म्हणाले की, हिंद-दी-चादर श्री गुरू तेगबहादूरसाहिबजी यांच्या शौर्य आणि बलिदानाला नमन करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. देशातील संस्कृती वाचवि्यासाठी आमच्या गुरूंनी हे बलिदान दिले आहे. गुरू तेगबहादूर यांनी धर्म संकल्पाचे पालन केले जबाबदारीचे पालन करताना गुरू तेगबहादूर यांना औरंगजेबाने कैद केले. त्यांना एकतर धर्म बदला किंवा मरण्यासाठी तयार राहा, असे सांगितले. या क्रूरतेसमोर गुरुजी न घाबरता आपले विचार आणि सनातन धर्माच्या संकल्पाचे पालन केले. त्यांच्यासोबत भाई सत्यदास, मतिदास आदींना मारण्यात आले, काहींचे तुकडे केले गेले. कोणाला गरम पाण्यात टाकण्यात आले. त्यानंतर गुरुजींचे शीर कापण्यात आले. यातून जे आमचे ऐकणार नाहीत त्यांचे असेच हाल होणार, हा संदेश देण्यात आला. मात्र, औरंगजेबाला हे माहीत नव्हते की, गुरुजींच्या बलिदानामुळे संपूर्ण देशांतर्गत प्रतिबद्धता निर्माण होईल. त्याचे इरादे कधीच पूर्ण होणार नाहीत, असेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले. सर्वांना जोडणारा विचार : धर्माच्या रक्षणासाठी लढत राहिले औरंगजेबाने जाहीर केले होते की, गुरुजींना अंतिम संस्कार कोणीही देणार नाही. दिल्लीच्या चांदणी चौकात गुरुदेवचे शीर पडले होते. लखीशा बंजाराजीने त्यांचे शरीर अंतिम संस्कारासाठी नेले. त्यानंतर दहावे गुरू गुरू गोविंदसिंघजी यांच्या दोन मुलांना पहिल्यांदा मारण्यात आले. त्यानंतर दोन मुलांना भिंतीमध्ये गाडण्यात आले. अशाही परिस्थितीत त्यांच्या मुलांनी आणि गुरुजींनी हार मानली नाही. धर्माच्या रक्षणासाठी लढत राहिले. हा इतिहास वीरता आणि शौर्याचा आहे. हा इतिहास शीख पंथापर्यंत मर्यादित न राहता भारतातील प्रत्येकाला माहीत झाला पाहिजे. आमच्या गुरूंनी केवळ शिखांसाठी बलिदान केले नाही तर संपूर्ण मानवतेसाठी दिले आहे. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नानक नामलेवा समाज एकत्र आला आहे. देशात जेव्हा समाज विखुरला होता तेव्हा गुरुनानक यांनी सर्वांना जोडणारा एक विचार दिला. शीख, सिखलीकर, लुभाना, सिंधी, बंजारा समाज एकत्र आला आहे. वारकरी समाजालाही जोडण्याचे काम केले. दुसऱ्या दिवशीही भाविकांची अलोट गर्दी रविवारी दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. देशातील विविध राज्यांतून आलेल्या सर्व धर्मांच्या भाविकांनी शांतता, शिस्त आणि श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक आणि सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही या कार्यक्रमासाठी उपस्थिती राहणार होती, परंतु अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. आयोजकांनी चांगली व्यवस्था केली होती.
इम्तियाज जलील हे निजामाचे पूर्वज आहेत. या राज्यात अशांतता कशी पसरेल हे त्यांचेलक्ष्य आहे. मुंब्रा येथील नगरसेविकेने तिच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. मात्र, इम्तियाज तेथे जाऊन तेल टाकत आहेत. दरम्यान, महापालिका निवडणुकीत शिवसेनेला जे अपयश आले त्याची परतफेड ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यश मिळवून करणार आहे. त्यामुळे निकालानंतर सर्वत्र शिवसेना पाहायला मिळेल, असा दावा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. एमआयएमचे काही नगरसेवक निवडून आले ते ठीक आहे. मात्र, इम्तियाज यांनी मुंब्रा येथे जाऊन पुन्हा वाद निर्माण केला आहे. हा छत्रपती शिवराय, राज्यात जातीय रंग द्यायचा प्रयत्न होत आहे. आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मुलीने माफी मागितली. मात्र, लगेच भूमिका बदलून हिंदुस्तान-पाकिस्तान ची भाषा करत आहे. इतकी मस्ती असेल तर पाकिस्तानात जा. येथे द्वेष पसरवू नका. याचे परिणाम तुम्हाला भोगावेलागतील. खासदार, आमदारकीच्यानिवडणुकीत आपण पराभूत झालोआहोत हे त्यांनी लक्षात ठेवलेपाहिजे, असा टोलाही त्यांनीलगावला. दरम्यान, संजय राऊतयांनी सरन्यायाधीशांच्यास्वागताबाबत केलेल्या टीकेबाबतशिरसाट म्हणाले की, राऊत यांनासंस्कृती आणि प्रोटोकॉल माहितीनाही. पैठणमधून दत्ता गोरडे आमचा विरोधकच पैठणमधून दत्ता गोरडे यांच्या आईभाजपकडून निवडणूक लढवतआहेत. याबाबत शिरसाट म्हणालेकी, दत्ता गोरडे आमचे विरोधकउमेदवार आहेत. त्यांना यानिवडणुकीत आम्ही पराभूत करू.विधानसभा नगराध्यक्षपदाच्यानिवडणुकीत आम्ही पराभव केलाआहे. येथेही त्यांचा पराभव होईल. भाजपचे काही ठिकाणी घाणेरडे राजकारण शिरसाट म्हणाले की, काही ठिकाणीभाजपने घाणेरडे राजकारण केलेआहे. त्याचा परिणाम युतीवर होतआहे. शिवसैनिक वैतागत असेल तरत्याचे परिणाम चांगले होणार नाहीत.धाराशिवच्या ए, बी फॉर्म वाटपघोळातल्या प्रकरणात आम्ही देवेंद्रफडणवीस तक्रार करणार आहोतअसे त्यांनी सांगितले.
पैठण तालुक्यातील ९ जिल्हा परिषद व १८ पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. तालुक्यात दिग्गज मैदानात उतरले आहेत.त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलीआहे. अनेकांनी साम-दामवरही भर दिला आहे. खासदार संदिपान भुमरे यांचे पुतणेशिवराज भुमरे पाचोड जिल्हा परिषद गटातूनलढत आहेत. येथे राष्ट्रवादी अजित पवारगटाचे उमेदवार त्यांच्या समोर आहेत.आमदार विलास भुमरे यांनी येथे विशेष लक्षदिले आहे. भुमरे यांचे विरोधक, नुकतेचभाजपमध्ये आलेले दत्तात्रय गोर्डे, नवगावगटातून लढत आहेत. नांदर गणातून ठाकरेगटाचे व माजी सभापती राहिलेले डॉ. सुनीलशिंदे आपले नशीब नांदरमधून अजमवतआहेत. येथे काँग्रेसचे नेते रविंद्र काळे यांनीशिवसेना शिंदे गटाबरोबर हातमिळवणी केलीआहे. पुतण्यांना येथून पंचायत समितीसाठी उभे केले आहे. माजी आमदार संजयवाघचौरे यांनी ढोरकीनमधून पत्नीलाउभे केले आहे. या दिग्गज नेत्यांनीआपल्या कुटुंबातील सदस्यांनानिवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.नेहमी कार्यकर्त्यांसाठी गावात नफिरकणारे नेते आता कुटुंबातीलसदस्यांसाठी डोर टू डोर जात आहेत.अनेक गटांमध्ये दिग्गजांसमोर नवीनचेहरे उभे असल्याने सामान्य मतदारकोणाच्या बाजूने राहणार, हे बघावेलागणार आहे. नेत्यांचा साम-दामवर जोर अनेक नेत्यांच्या घरातील सदस्यउमेदवार असल्याने सर्कलमध्येप्रचार करत असतानासाम-दामवर भर दिला जातआहे. नेहमी कार्यकर्त्यांसाठी एकरुपयाही न लावणारे नेते आतालाखो रुपये आपल्या कुटुंबातीलउमेदवारांच्या प्रचारासाठी खर्चकरीत आहेत. खरा मतदार राजाआपली ताकद काय दाखवतो, हेनिकालानंतरच कळेल. ऐरवी नदिसणारे नेते आता गावोगावदिसत आहेत. शिंदे गटासमोर भाजपचे आव्हान पैठण तालुक्यात ग्रामीण भागात काँग्रेस,शिवसेना व राष्ट्रवादीचे संघटन मजबूतमानले जाते. अलीकडील स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुकांनंतर भारतीय जनतापक्षही पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे.सध्या भाजपमध्ये दत्तात्रय गोर्डे आल्यानेभाजप पुरस्कृत उमेदवार सर्व ठिकाणीदेण्यात आले आहेत. यामुळे शिवसेनाविरोधी भाजप अशी लढत अनेक गटातहोणार आहे. महाविकास आघाडीमधीलनेत्यांमध्ये समन्वय नसल्याने उमेदवार उभेकेले असले तरी नेतृत्व करण्यासाठी नेतानसल्याचे स्थानिकांना दिसून येत आहे. गोर्डे भुमरेंचे मुख्य विरोधक शिवराज भुमरे हे पहिल्यांदाच जि.प.लढत असून विकासाचा मुद्दा घेऊनते मतदारांकडे जात आहेत. संजयवाघचौरे यांच्या पत्नी सुनिता याढोरकीनमधून जिल्हा परिषद लढतआहेत. या भागात त्यांचे नातेगोतेजास्त आहेत. तर, डॉ. सुनील शिंदेनांदर गणातून लढत असून त्यांना यानिवडणुकीत या पूर्वीचा अनुभवकामी येईल. दत्तात्रय गोर्डे यांच्याआई चंद्रकला या नवगाव गटातूनलढत आहेत. गोर्डेंकडे भुमरेंचे मुख्यविरोधक म्हणून पाहिले जाते.
मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेची सूत्रे हाती घेण्यासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच आता भाजपमध्ये महापौरपदाच्या उमेदवारीसाठी अंतर्गत गटबाजी आणि लॉबिंगला उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील उमेदवारालाच संधी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात असले तरी पक्षातील विविध गटांनी आपापल्या समर्थकांसाठी दिल्ली आणि नागपूरपर्यंत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधील नगरसेविका रितू तावडे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. तावडे यांच्यासाठी विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि आमदार प्रसाद लाड यांनी कंबर कसली आहे. तावडे या मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करत असून त्यांना घाटकोपर पूर्व या सुरक्षित जागेवरून निवडून आणण्यात चित्रा वाघ यांची मोठी भूमिका होती. नागपूरविरुद्ध स्थानिक नेत्यांचा जोर बोरिवलीतून ओबीसी कोट्यातून निवडून आलेल्या रीना द्विवेदी-निघुट यांच्यासाठी पक्षातील “नागपूर लॉबी’ सक्रिय झाली आहे. द्विवेदी यांना उमेदवारी मिळण्यामागे नागपूरमधील बड्या नेत्यांचा हात असल्याचे बोलले जाते. मात्र, मुंबई महापौरपद खुला प्रवर्ग (महिला) साठी आरक्षित झाल्याने ओबीसी उमेदवाराला संधी मिळेल का, याबाबत साशंकता आहे. मुंबई भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मात्र आपल्या बांद्रा पश्चिम विधानसभा क्षेत्रातील स्वप्ना म्हात्रे यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. म्हात्रे या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. ‘सामान्य’ आरक्षण असूनही भाजपचा ओबीसी कार्डावर विचार? मुंबईच्या महापौरपदाची लॉटरी “सामान्य महिला’ गटासाठी निघाली असली तरी भाजपमध्ये जातीच्या समीकरणापेक्षा आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील प्रभाव पाहिला जात आहे. एका वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले की, आरक्षण खुल्या प्रवर्गाचे असले तरी भाजप ओबीसी मतांना आकर्षित करण्यासाठी रीना द्विवेदी किंवा स्वप्ना म्हात्रे यांना संधी देऊ शकते. रितू तावडे यांच्यासाठी फील्डिंग लावणारे दरेकर आणि लाड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.
पोहरेगाव जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात
पोहरेगाव : वार्ताहर जिल्हा परिषद पोहरेगाव आणि पंचायत समिती निवाडा-पोहरेगाव गण याच्या निवडणूक प्रचाराच्या शुभारंभ रविवार २५ जानेवारी रोजी डिघोळ (ता. रेणापूर) येथील ग्रामदैवत सोमलिंगेश्वर यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेणाचे माजीं चेअरमन सर्जेराव मोरे होते तर मंचावर प्रमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, रेणाचे संचालक स्रेहल देशमुख, […] The post पोहरेगाव जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर : प्रतिनिधी सध्याच्या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासने देणा-यांनी प्रत्यक्षात बळीराजाला हतबल आणि कर्जबाजारी केले आहे. भाजपने केवळ घोषणांचा पाऊस पाडला पण विकासाच्या बाबतीत त्यांचे काम शून्य आहे, अशा शब्दांत माजी आमदार धिरज देशमुख यांनी सत्ताधा-यांवर कडाडून टीका केली. लातूर जिल्हा परिषद व पंचायत […] The post भाजपकडून केवळ घोषणांचा पाऊस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महात्मा बसवेश्वरांचे विचार, तत्त्वज्ञान व कार्याचा अंगीकार महाराष्ट्रातील संतांनी केला
लातूर : प्रतिनिधी महात्मा बसवेश्वरांचे विचार, तत्त्वज्ञान आणि कार्याचा महाराष्ट्रातील संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम या मध्ययुगातील संतांच्या मांदियाळीवर प्रभाव होता, असे प्रतिपादन कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांनी केले. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्यावतीने आयोजित महात्मा बसवेश्वर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ‘महात्मा बसवेश्वर आणि महाराष्ट्रातील संत परंपरा’ या विषयावर गुंफत असताना बोलत होते. या […] The post महात्मा बसवेश्वरांचे विचार, तत्त्वज्ञान व कार्याचा अंगीकार महाराष्ट्रातील संतांनी केला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सेवा पदकाने आज ९८२ पोलिस कर्मचा-यांचा गौरव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलिस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण ९८२ अधिकारी व कर्मचा-यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील ८९ अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश असून, विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात ३१ पोलिस कर्मचा-यांना वीरता पदक, उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी […] The post सेवा पदकाने आज ९८२ पोलिस कर्मचा-यांचा गौरव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उमेदवारांचे उद्या चित्र स्पष्ट होणार
लातूर : प्रतिनिधी लातूर तालुक्यामध्ये लातूर पंचायत समितीच्या २० गणासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी होऊन १९ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले, तर १०१ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या १० गटांसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी झाली असता ९ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले, तर ६३ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत. उमेदवारांना नामनिर्देशनपत्र परत […] The post उमेदवारांचे उद्या चित्र स्पष्ट होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कॅ. शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र
सर्वोच्च सैन्य पुरस्काराने होणार गौरव नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आतंरराष्ट्रीय अवकाश केंद्राला भेट दिली होती. या दरम्यान अवकाश संशोधन केंद्रात त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून भारत सरकारने अशोक चक्र हा शांतता काळातील सर्वोच्च सैन्य सन्मान पुरस्कार जाहीर केला आहे. शुभांशू शुक्ला यांनी २६ जून २०२५ ला नासाच्या […] The post कॅ. शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बॉलिवूड विश्वाला हादरवणारी गंभीर घटना समोर आली असून धुरंधर चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेता नदीम खानवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरकाम करणाऱ्या महिलेवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबईतील मालाड येथील मालवणी पोलिसांनी कारवाई करत नदीम खानला अटक केली आहे. मनोरंजन विश्वाशी संबंधित व्यक्तीवर असे गंभीर आरोप झाल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली असून, सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. मालाडच्या मालवणी परिसरातून ही घटना उघडकीस आली आहे. तक्रारदार महिला ही अभिनेता नदीम खानच्या घरी घरकाम करत होती. या काळात आरोपीने तिच्याशी जवळीक वाढवून लग्नाचे खोटे आश्वासन दिले आणि त्याचा गैरफायदा घेत अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप महिलेने केला आहे. तक्रारीनुसार, सन 2015 पासून नदीम खानने महिलेचा विश्वास संपादन करत वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सुरुवातीच्या काळात महिलेला तक्रार करण्याची भीती वाटत होती. आरोपी प्रसिद्ध अभिनेता असल्याने समाजात आपली बदनामी होईल, या भीतीने ती गप्प राहिली असल्याचेही तिने सांगितले आहे. मात्र, कालांतराने आरोपीने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला आणि मानसिक छळ वाढवल्यानंतर महिलेने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. सतत मानसिक दबाव, फसवणूक आणि शोषण सहन करावे लागत असल्याने न्याय मिळवण्यासाठी तिने धैर्याने तक्रार दाखल केली. महिलेच्या जबाबावरून मालवणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत नदीम खानला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत तक्रारीतील बाबी गंभीर स्वरूपाच्या असल्याचे स्पष्ट झाल्याने आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. आरोपीने अशाच प्रकारे इतर महिलांनाही फसवले आहे का, किंवा यासंदर्भात आणखी काही तक्रारी पुढे येतात का, याची चौकशी केली जात आहे. मुंबई शहरात त्याच्या संपर्कात आलेल्या इतर महिलांचीही माहिती घेतली जात असून, संपूर्ण प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे बॉलिवूडमधील काही कलाकारांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिस तपासानंतर या प्रकरणातील पुढील सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांतील कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. या घोषणेत महाराष्ट्रासाठी विशेष अभिमानाची बाब म्हणजे नक्षलप्रभावित आणि अतिदुर्गम भागात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या गडचिरोली पोलिस दलाच्या 31 अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे. देशभरात जाहीर झालेल्या एकूण 121 शौर्य पदकांपैकी 31 पदके एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील जवानांना मिळाल्याने राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. जिल्ह्याच्या सीमावर्ती आणि जंगलांनी वेढलेल्या भागात पोलिस दल सतत नक्षलवाद्यांच्या धोक्याखाली कार्यरत असते. अशा कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या जवानांचे मनोबल या पुरस्कारामुळे निश्चितच उंचावले आहे. जंगलातील चकमकी, दुर्गम भागातील शोध मोहिमा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येणाऱ्या कारवायांमध्ये गडचिरोली पोलिस दलाने वेळोवेळी धाडस दाखवले आहे. याच शौर्याची आणि समर्पित सेवेची दखल घेत केंद्र सरकारकडून हे सन्मान जाहीर करण्यात आले आहेत. 22 एप्रिल 2018 हा दिवस गडचिरोली पोलिस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. भामरागड तालुक्यातील बोरीया–कसनासूर या घनदाट जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली होती. या एका मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेत गडचिरोली पोलिसांनी 40 नक्षलवाद्यांना ठार करत ऐतिहासिक यश मिळवले होते. नक्षलवादाविरोधातील आतापर्यंतच्या कारवायांमधील ही सर्वात मोठी आणि निर्णायक कारवाई मानली जाते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि प्रचंड जोखमीच्या परिस्थितीत ही मोहीम यशस्वी करण्यात आली होती. या धाडसी कारवाईत प्रत्यक्ष शौर्य गाजवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या कामगिरीची आता राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. या मोहिमेत सहभागी असलेले पोलिस निरीक्षक अमोल फडतरे, पोलिस उपनिरीक्षक मधुकर नैताम, वासुदेव मडावी, विलास पोरतेट, संतोष नैताम यांच्यासह एकूण 31 जवानांना पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे. या सन्मानामुळे नक्षलविरोधी लढ्यात सहभागी असलेल्या प्रत्येक जवानाचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला असून, त्यांच्या कार्याला देशपातळीवर मान्यता मिळाली आहे. शौर्य पदकांसोबतच पोलिस दलात मोठ्या प्रमाणात पदोन्नती जाहीर करण्यात आल्या आहेत. एकूण 394 पोलिस अंमलदारांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पदोन्नती देण्यात आली आहे. कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या 14 शहीद जवानांचाही मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये 7 हवालदारांना सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर, तर 7 पोलिस नाईकांना पोलिस हवालदार पदावर मरणोत्तर पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय विशेष कामगिरी करणाऱ्या 10 जवानांना वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली असून, त्यात 82 हवालदारांना सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून आणि 303 पोलिस नाईकांना पोलिस हवालदार म्हणून बढती देण्यात आली आहे. दरम्यान, भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील पोलिस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांमधील एकूण 982 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदक जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 89 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या कर्तव्यदक्षतेचा आणि सेवाभावाचा सन्मान म्हणून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील पोलिस दलामध्ये समाधान आणि अभिमानाचे वातावरण आहे. पोलिस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे यांना राष्ट्रपती पदक या यादीत भंडारा जिल्ह्यालाही मानाचा सन्मान मिळाला आहे. भंडाऱ्यातील राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल (MSM) राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. घुमरे हे भंडारा जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रपती पदक विजेते पोलिस उपनिरीक्षक ठरले आहेत. 1991 च्या बॅचचे पोलिस अंमलदार असलेल्या घुमरे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात गुप्त वार्ता विभागात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली असून, त्यांच्या कार्याची दखल आता थेट राष्ट्रपती स्तरावर घेण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून देशातील कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा, आरोग्य आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. उद्या नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. यंदाच्या यादीत पाच राजकीय नेत्यांचा समावेश असून महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला असून शिवसेना ठाकरे गटाने या पुरस्काराला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरून आपली प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपवर थेट आरोप केले. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला, अशा व्यक्तीला पद्मभूषण देऊन सन्मानित केलं जात आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करते, छान! अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. राऊत यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून भाजप आणि ठाकरे गटामध्ये नव्या वादाची ठिणगी पडली आहे. संजय राऊत यांनी आपल्या टीकेमध्ये केंद्र सरकारवर आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपचे सरकार सत्तेत बसवण्यात आलं. या प्रक्रियेत ज्यांची भूमिका होती, त्यांनाच मोदी सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, असे राऊत म्हणाले. तसेच, अशा व्यक्तीला राष्ट्रीय पुरस्कार देणे म्हणजे महाराष्ट्राच्या भावना दुखावण्यासारखे असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. त्यांच्या मते, हा पुरस्कार केवळ सन्मान नसून तो एका विशिष्ट राजकीय भूमिकेचा पुरस्कार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी 2019 ते 2023 या कालावधीत महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या कार्यकाळात राज्यातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल म्हणून घेतलेल्या भूमिकेमुळे ते सातत्याने चर्चेत होते. तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी त्यांनी राज्यपाल म्हणून शपथ दिली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले, तेव्हाही भगतसिंह कोश्यारी हेच महाराष्ट्राचे राज्यपाल होते. राज्यपालपदाच्या काळात भगतसिंह कोश्यारी यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता. यापूर्वी ते उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री राहिले असून केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. दीर्घ राजकीय कारकिर्दीमुळे ते राष्ट्रीय राजकारणात ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व आहेत. मात्र, त्यांच्या काही वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. वादग्रस्त विधानांमुळे राज्यभर संतापाची लाट विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बालविवाहासंदर्भातील अवमानकारक टिप्पणीमुळे विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता. त्या काळात त्यांच्या राजीनाम्याचीही जोरदार मागणी करण्यात आली होती. या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता अशा पार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने पुन्हा एकदा तोच वाद नव्याने उफाळून आला आहे. संजय राऊत यांच्या आक्रमक प्रतिक्रियेमुळे हा विषय अधिक तापला असून आगामी काळात या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे. पद्म पुरस्कारासारख्या सन्मानावरून निर्माण झालेला हा वाद केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक संवेदनांशी जोडला गेल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
राज्यातील महामार्गांवर अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. दररोज वर्तमानपत्रे आणि माध्यमांमधून भीषण अपघातांच्या बातम्या समोर येत असून त्या मन सुन्न करणाऱ्या आहेत. अशाच एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या अपघाताची घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी परिसरात दुचाकी आणि भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भीषण धडकेत आजोबा आणि त्यांचा अवघ्या सहा वर्षांचा नातू जागीच ठार झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्दैवी घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील बायपासवरील कढोली फाट्याजवळ घडली. देशमुख चुनीलाल राठोड हे आपली पत्नी बेबीबाई राठोड आणि नातू परेश राठोड यांच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करत होते. नुकत्याच खरेदी केलेल्या कारच्या कागदपत्रांच्या कामासाठी ते जळगावला आले होते. काम पूर्ण करून तिघेही दुचाकीने आपल्या गावी परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की आजोबा आणि नातवाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात बेबीबाई राठोड या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीचा चालक घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली. मात्र, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चालकाला ताब्यात घेतले असून ट्रॅक्टर ट्रॉलीसह त्याला पाळधी पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच जळगाव जिल्हा रुग्णालयात नातेवाईक आणि गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे दृश्य पाहून वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
टीम इंडियाचा न्यूझीलंडला मालिकेत धोबीपछाड
गुवाहाटी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीचे तीन सामने जिंकून भारताने मालिका खिशात घातली आहे. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी १५४ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने १० षटकांत फक्त २ गडी गमवून पूर्ण केले. अभिषेक शर्माने नाबाद ६८ धावा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद ५७ धावांची […] The post टीम इंडियाचा न्यूझीलंडला मालिकेत धोबीपछाड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर येथील बालाजीनगर परिसरात माहेश्वरी अन्नकुट ग्रुपच्या वतीने प्रभाग क्रमांक 20 आणि 21 मधील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या लोकप्रतिनिधींना समाजाच्या वतीने सन्मानित करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हा सत्कार सोहळा बालाजीनगरमधील अशोक भुतडा यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माहेश्वरी समाजाच्या परंपरेनुसार नवनिर्वाचित नगरसेवकांचा राजस्थानी पगडी, शाल, श्रीफळ, हार, पुष्पगुच्छ आणि पेढे देऊन गौरव करण्यात आला. प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेवक गणेश नांवदर, त्रिंबक तुपे, जालिंदर शेंडगे, अनिता मानकापे आणि अर्चना निळकंठ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर प्रभाग क्रमांक 21 मधील नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, नंदकिशोर गवळी, सुमित्रा मात्रे आणि कमल थोरात यांनाही सन्मानित करण्यात आले. सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या सोहळ्यास उपस्थित होते. सत्कारप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नगरसेवकांच्या विजयाबद्दल समाधान व्यक्त करत, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. समाजाच्या विकासासाठी आणि परिसराच्या प्रगतीसाठी सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे काम करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. माहेश्वरी अन्नकुट ग्रुप समाज नेहमीच सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माहेश्वरी अन्नकुट ग्रुपचे राजेंद्र मुंदडा, बस्तीराम चांडक, द्वारकादास बाहेती, शिवप्रसाद मुंदडा, अशोक भुतडा, महेश राठी, गणेश हेडा, अॅड. संतोष मालपणी आणि विजयकुमार लाहोटी यांनी विशेष परिश्रम घेतले. या सत्कार सोहळ्यास माहेश्वरी समाजासह इतर समाजातील अनेक नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे आणि सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले.
राष्ट्र उभारणीत महिलांची महत्त्वाची भूमिका
नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला रविवारीदेशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात त्यांनी गेल्या वर्षी देशाच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. त्यांनी देशाच्या मुलींच्या कामगिरीचे कौतूक केले असून राष्ट्र उभारणीत महिलांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगत तरुण देशाला दिशा देत असल्याचे म्हटले जात […] The post राष्ट्र उभारणीत महिलांची महत्त्वाची भूमिका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रोहित शर्मा, हरमनप्रीत कौरचा पद्मश्रीने गौरव
नवी दिल्ली : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने नागरी पुरस्कारांची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाची वर्ल्ड कप विजेती कॅप्टन जोडी रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांच्यासह लोकप्रिय अभिनेता आर. माधवन यास २०२६ चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्मा आणि महिला संघाची धडाकेबाज कर्णधार हरमनप्रीत कौर […] The post रोहित शर्मा, हरमनप्रीत कौरचा पद्मश्रीने गौरव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

24 C