वेळापूर (ता. माळशिरस) येथील श्री बृहन्मठ या वीरशैव लिंगायत धर्मातील मोठ्या मठांपैकी एक असलेल्या मठाचे मुक्तेश्वर शिवाचार्य यांचा अमृत महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रम आणि भव्य मिरवणुकीने साजरा करण्यात आला. या महोत्सवानिमित्त मठाचे शिवाचार्य सदाशिव यांनी ३ दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पहिल्या दिवशी ध्वजारोहणाने शुभारंभ झाला. गुरुगादीस रुद्राभिषेक, गणेशयाग व महारुद्रयाग स्वाहाकार, भजन-कीर्तन, संगीत आणि नवचंडी याग पार पडले. सायंकाळी मुक्तेश्वर शिवाचार्य यांची नाणे, श्रीफळ, पेढा, दूध, गहू, गूळ व तांदूळतुला झाली. मिरवणूक आणि सुवर्ण पट्टाभिषेक सायंकाळी ७ वाजता पालखी मैदान, काळा मारुती मंदिर, व्यापारी पेठ ते श्री बृहन्मठ या मार्गावरून पंचाचार्य जगद्गुरूंची भव्य अड्डापालखी व शिवाचार्य मिरवणूक सोहळा संपन्न झाला. कलशधारी महिला, भजन, ढोल-ताशा आणि पारंपारिक नृत्याने मिरवणुकीची शोभा वाढवली. विद्युत बग्गी व छत्री आकर्षणाचे केंद्र ठरली.
33 केव्ही लाईन हटवण्यासाठी महावितरणवर महिलांचा ठिय्या
मोहोळ शहरातील बागवान नगर आणि अहिल्यानगर परिसरात घरावरील ३३ केव्ही विद्युत वाहिनीचा शॉक लागून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि महिलांनी मंगळवारी (१६ एप्रिल) महावितरणच्या कार्यालयावर धडक देत सकाळपासून ठिय्या आंदोलन मांडले. अखेर प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत ही धोकादायक लाईन अन्य मार्गाने वळवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. दि. १५ एप्रिल रोजी बागवान नगरमधील लक्ष्मी विजय आदलिंगे (वय ३२) या यात्रेनिमित्त घराच्या स्लॅबवर स्वच्छता करत होत्या. यावेळी वरून गेलेल्या ३३ केव्हीच्या उच्च दाबाच्या वाहिनीने त्यांना ओढून घेतले. विजेचा तीव्र झटका बसल्याने त्या गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत महिला आणि ज्येष्ठ नेते पद्माकर देशमुख, नगरसेवक चैतन्य देशमुख, सरफराज सय्यद, नाना मांडवे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जोपर्यंत लाईन बदलली जात नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी ठाम भूमिका घेण्यात आली. अखेर उपकार्यकारी अभियंता जी. जी. पटवेगार आणि शहर अभियंता नागेश खडतरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ३० एप्रिलपर्यंत लाईन शिफ्ट करण्याचे लेखी पत्र दिले. या आंदोलनात पद्माकर देशमुख, नाना मांडवे, सरफराज सय्यद, लखन ठोंबरे, बिलाल मोमीन, सचिन बनसोडे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकवस्ती परिसरातील धोकादायक ३३ केव्ही लाईन ३० एप्रिलपर्यंत अन्य मार्गाने शिफ्ट केली जाईल, असे लेखी आश्वासन वीज वितरण कंपनीच्या वतीने देण्यात आले आहे. महावितरणचे आश्वासन
वाशिंबे उजनी लाभक्षेत्रात विद्युत पंपातील वायडींग तारा तसेच विद्युत पंप चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उंदरगाव व सोगाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी विद्युत पंपाच्या आतील वायडींग तारा तसेच संपूर्ण पंप चोरीच्या घटनासमोर आल्या आहेत. या घटनांमुळे ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उंदरगाव (ता. करमाळा) येथे रविवार (दि. १२) रोजी अमोल महादेव बोबडे (रा. वाशिंबे) यांच्या १२ एचपी क्षमतेच्या विद्युत पंपातील वायडींग चोरीला गेले. तसेच मगर या शेतकऱ्याच्या ७ एचपी पंपातील वायडींगही चोरट्यांनी लंपास केले. यापूर्वी सोगाव पश्चिम येथे शनिवार (दि. ११) रोजी रामहरी दत्तात्रय गोडगे यांचा १२ एचपी विद्युत पंप तसेच त्याच दिवशी गोरख पाखरे यांचा १० एचपी पंप चोरीला गेला होता. या सलग घटनांमुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उजनी लाभक्षेत्रातील वाशिंबे, खातगाव, केतूर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी गस्त वाढवून अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी स्थानिकांकडून होत आहे. ^विद्युत पंप चोरीच्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस प्रशासना कडून तपास सुरू आहे. नागरिकांनी संशयित व्यक्तींबाबत माहिती देऊन सहकार्य करावे,माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल. तसेच या घटनांना आळा घालण्यासाठी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे संदीप बनकर, पोलिस उपनिरीक्षक, करमाळा ग्रामीण पोलीस आरोपींवर कठोर कारवाई करावी ^मागील अनेक दिवसांपासून उजनी जलाशय परिसरातील खातगाव, केतूर, पारेवाडी, वाशिंबे, सोगाव पश्चिम व पूर्व आणि उंदरगाव येथे विद्युत पंप तसेच त्यातील वायंरिंग, मोटार स्टार्टरं इत्यादी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या शेतीवर गंभीर परिणाम होत आहे. या संदर्भात अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रारी दाखल करूनही अद्यापपर्यंत कोणत्याही घटनेत ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले असून चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी. अँड. मनोज घनवट, शेतकरी, सोगाव उजनी लाभक्षेत्रात विद्युत पंप व त्यातील वायंडिंग चोरीच्या घटनांनी मोठा उच्छाद मांडला आहे. वारंवार घडणाऱ्या या चोरीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून पोलीस यंत्रणा निष्क्रिय असल्याची टीका होत आहे. चोरीची पद्धत सारखीच असल्याने एकाच टोळीचे कारस्थान असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या घटनांमुळे चोरट्यांचा वाढलेला आत्मविश्वास स्पष्ट दिसून येत आहे.आत्मविश्वास दूणावलेले चोरटे पोलिसांना खुलेआम आव्हान देत आहे.अनेक दिवसांपासून विद्युत पंप व वायंडींग चोरीच्या घटना सुरू असूनही पोलिसांना चोरटे सापडत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बार्शी तालुक्यातील मुंगशी व परिसरातील दहिटणे, सासुरे, राळेरास, तडवळे, यावली, इर्लेवाडी आदी गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या अस्मानी संकटामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून, हातातोंडाशी आलेल्या बेदाण्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. वर्षभर पोटच्या लेकराप्रमाणे जोपासलेल्या द्राक्ष बागेवर एका क्षणात पाणी फेरले गेल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. मुंगशी येथील शेतकरी अर्जुन श्रीपती क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वीच जालिंदर राऊत यांच्या शेडवर आपला द्राक्षाचा माल बेदाणा करण्यासाठी टाकला होता. मात्र, अचानक आलेल्या वादळाने शेडवरील शेडनेट आणि कागद फाडून टाकले. जोराच्या पावसामुळे शेडवर असलेला अंदाजे ७ ते ८ टन बेदाणा भिजल्याने त्याचा अक्षरशः चिखल झाला आहे. द्राक्ष बागेसाठी महागडी औषधे, खते आणि मजुरीवर केलेला अमाप खर्च आता वाया गेला आहे. काही शेतकऱ्यांचे पीक अजूनही झाडावरच आहे, तर काहींनी माल शेडवर वाळत घातला होता. या अस्मानी संकटामुळे उत्पादनाऐवजी कर्जाचा डोंगर उभा राहण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरीव मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अवकाळीच्या फटक्याने केवळ पिकांचेच नव्हे, तर शेडचेही मोठे नुकसान झाले आहे. आता प्रशासन कधी धावून येणार, याकडे बळीराजाचे डोळे लागले आहेत. ^वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून सावरण्यासाठी शासनाने त्वरित मदत करणे आवश्यक आहे. अजय क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक शेतकरी, मुंगशी ^अफाट झालेला खर्च आणि वाढती महागाई यामुळे शेतकरी आधीच संकटात आहे. त्यातच या वादळी पावसाने बेदाण्याचे मोठे नुकसान केले आहे. अर्जुन क्षीरसागर, नुकसानग्रस्त शेतकरी, मुंगशी त्वरित मदत करावे
अमळनेर तालुक्यातील मारवडयेथील प्राथमिक आरोग्य केंद्राचाभोंगळ कारभार समोर आला आहे.गुरुवारी रात्री उपचारासाठीआलेल्या एका बालिकेला आरोग्यकेंद्राला कुलूप असल्यानेउपचाराविना परतावे लागले. याप्रकारामुळे खेडी येथील ग्रामस्थांनीतीव्र संताप व्यक्त केला असून हेआरोग्य केंद्र नक्की कुणाच्याभरवशावर सुरू आहे, असा प्रश्नउपस्थित केला जात आहे. तालुक्यातील खेडी येथील प्रवीणजगन्नाथ पाटील यांची मुलगीगुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारासघरात चक्कर येऊन पडली.त्यामध्ये ती जखमी झाली. गावातवैद्यकीय सुविधा नसल्यामुळे तिचेवडील तिला तातडीने मारवडयेथील प्राथमिक आरोग्य केंद्रातघेऊन गेले. मात्र, कोट्यवधी रुपयेखर्च करून उभारलेल्या या सुसज्ज आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारालाच कुलूप होते. रात्रपाळीत एकही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी तेथे उपस्थित नव्हता. अखेर उपचार न मिळाल्याने वडिलांना आपल्या जखमी मुलीला घेऊन माघारी फिरावे लागले. मारवड हे पंचक्रोशीतील मुख्य आरोग्य केंद्र असून त्याअंतर्गत चार उपकेंद्रे येतात. मात्र, मुख्य केंद्रातच सेवा कोलमडली असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेबाबत खेडी येथील ग्रामस्थ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. अशी माहिती ग्रामस्थांनी यावेळी दिली. दोन दिवसांत कर्मचारी रात्री उपस्थित राहणार सध्यास्थितीत दवाखान्यासहकर्मचारी निवासाचे बांधकाम सुरु आहे. विजेची सुविधा नसल्यानेकर्मचाऱ्यांना रात्रपाळीस अडचणीयेतात. त्यामुळे ते उपस्थित राहूशकले नाहीत. दोन ते तीन दिवसातकर्मचारी उपस्थित राहतील. असेवैद्यकीय अधिकारी डॉ. साहिलचौधरी यांनी सांगितले.
शहरासह जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून सूर्याचा प्रकोप वाढला आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक होरपळून निघाले आहेत. ९ एप्रिलला ३४ अंशांवर असलेला पारा अवघ्या नऊ दिवसांत ४२ अंशांपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी (१७ मार्च) शहराचे तापमान ४० अंशावर होते. दिवसभर कडक उन्हाबरोबर सायंकाळी काहीसे ढगाळ वातावरण तयार झाल्याने वातावरणात उकाडा वाढला होता. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शनिवारपासून, १८ एप्रिल उन्हाळी सुट्टी लागेपर्यंत शाळा सकाळी ७ ते ११ या वेळेतच भरतील. ९ एप्रिलपासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. १२ एप्रिलला पारा ४० अंशांवर गेला, तर १५ एप्रिलला तो ४२ अंशांपर्यंत पोहोचला होता. शुक्रवारी (१७ एप्रिल) तापमान ४० अंशांवर होते, मात्र उन्हाची तीव्रता कायम होती. सायंकाळी ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात अधिकच वाढ झाली आहे.रात्रीचा उकाडा अधिक प्रमाणात जाणवत होता. यापुर्वी मार्चमध्ये ३९ अंशावर तापमान गेले होते. त्यानंतर १९,२० मार्चला ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली होती. १ ते ३ एप्रिल या कालावधीत देखील ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस झाला होता. त्यानंतर ५ एप्रिलपासून तापमानात वाढ होऊ लागली होती. का बदलले वातावरण? कमी दाबाचा पट्टा: दक्षिण भारत ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. ४० अंशांवरील तापमानामुळे स्थानिक पातळीवर बाष्पीभवन वेगाने होत असून अरबी समुद्राकडून आर्द्रता येत आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाऱ्यांच्या मिलाफामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. { तीव्र उष्णतेनंतर आता जिल्ह्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने १९ ते २१ एप्रिल दरम्यान जिल्ह्यासाठी 'येलो अलर्ट' जारी केला आहे. { वादळी वारे: ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता. { विजांचा कडकडाट: विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज. { कारण: दक्षिण भारत ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून अरबी समुद्राकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे.
शहरातील कुंभार गल्ली येथे संत गोरोबा काका समाधी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त आरोग्य शिबीर घेण्यात आले. स्थानिक नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच विविध कीर्तन, भजन व धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरण अधिकच भारावून गेले. यावेळी आमदार संग्राम जगताप, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे उपस्थित होते. मान्यवरांनी संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत अशा कार्यक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते, असे मत व्यक्त केले. आ. जगताप म्हणाले, संत गोरोबा काका यांची शिकवण ही समाजाला एकत्र आणणारी आणि माणुसकीची जाणीव करून देणारी आहे. अशा धार्मिक सोहळ्यांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तरुण पिढीला संस्कारांची दिशा मिळते. पुढील काळातही अशा उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. कुंभार गल्ली समितीचे अध्यक्ष जयकुमार सुसरे, उपाध्यक्ष राहुल देवतरसे तसेच संत गोरोबा काका मंडळ व शिरोमणी प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.
नेवाशामध्ये 7 महिन्यांत पाइपलाइनवर 40 लाख खर्च, तरीही 7 दिवसांनी पाणी!
नेवासे नगरपंचायतीचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव, मुख्याधिकाऱ्यांची मनमानी आणि पाइपलाइन दुरुस्तीच्या नावाखाली झालेला लाखांचा कथित खर्च यावरून नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी धाव घेतली आहे. नगरपंचायतीत नक्की चाललंय काय? असा सवाल करत संतप्त नगरसेवकांनी जिल्हा सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) हराळ यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली. विरोधी नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार प्रत्येक सभेचे इतिवृत्त व ठराव नागरिकांसाठी खुले ठेवणे तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. मात्र नेवासे नगरपंचायतीत सर्वसाधारण सभा, विशेष सभा तसेच प्रशासकीय काळातील सभांचे इतिवृत्त मागणी करूनही उपलब्ध करून दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या प्रशासकीय सभेतील ठरावांच्या प्रती मिळाव्यात म्हणून लेखी अर्ज केले. तसेच जिल्हा सहआयुक्त, नगरपालिका प्रशासन यांनीही संबंधित कागदपत्रे देण्याचे निर्देश दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुख्याधिकारी निखिल फराटे नियमित वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांची कामे रखडत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. प्रशासनाने कारवाई करावी, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे नगरसेवकांनी दिला आहे. हे निवेदन उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान, गटनेते जितेंद्र कुऱ्हे, जयश्री शिंदे, संभाजी धोत्रे, स्वप्निल मापारी, शहीदाबी पठाण, सोनल चव्हाण, नसरीन शेख, शोभा व्यवहारे व राजेंद्र काळे यांनी दिले आहे.
‘दाक्षायणी’च्या यात्रेची उद्या सांगता:2 दिवस शिल्लक राहिल्याने लासूरगावकडे ओघ
लासूरगाव (ता. वैजापूर) येथील मराठवाड्याची कुलस्वामिनी श्री देवी दाक्षायणी मातेच्या यात्रेला आता दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. १९ एप्रिलला अक्षय तृतीया, रविवारी दाक्षायणी देवीच्या यात्रेची सांगता होणार आहे. शुक्रवार देवीचा शेवटचा वार असल्याने १७ एप्रिल रोजी मंदिरात आतापर्यंतच्या तुलनेत सर्वाधिक गर्दी झाली होती. दिवसा उन्हामुळे सायंकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत मंदिर भाविकांनी फुलून गेले होते. कात्रड (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) येथील देवीचे भक्त पोपटराव लांडगे यांनी समर्थ अर्थमूव्हर्स मित्र मंडळाकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. मंदिराच्या वतीने पोपटराव लांडगे यांचा सत्कार करण्यात आला. ५ एप्रिल रोजी श्री देवी दाक्षायणी मातेच्या वस्त्रालंकाराने यात्रेला सुरुवात झाली होती. आतापर्यंत तीन लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले आहे. उष्णतेमुळे दिवसा कमी. रात्री गर्दी वाढत आहे. वैजापूरचे तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या संकल्पनेतून दर्शन रांगेतील भाविकांना पूजा व आरतीचा मान देण्याची परंपरा सुरू आहे. तेरा दिवसांत दररोज तीन वेळा होणाऱ्या आरतीचा मान ३९ सपत्नीक भाविकांना मिळाला. यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने मंदिरातील संपूर्ण व्यवस्थापन. भाविकांच्या सुविधांचा आढावा दररोज दोन वेळा घेतला जातो, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिचंद्रे यांनी दिली. शुक्रवारी गारज येथील रांगोळी चित्रकार भगवान सरोवर यांनी देवीच्या दर्शनी भागासमोर अप्रतिम रांगोळी रेखाटली. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ती आकर्षक ठरली.
उष्णतेचा कहर:सोयगावचा पारा 42 अंशांवर, खबरदारी म्हणून ग्रामीण रुग्णालयांत उष्माघात कक्ष सज्ज
तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा कडाका झपाट्याने वाढू लागला आहे. शुक्रवारी (१७ एप्रिल) तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. वाढत्या उन्हामुळे निर्माण होणारा आरोग्याचा धोका लक्षात घेता, आरोग्य विभागाने सोयगाव उपजिल्हा रुग्णालयासह तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तातडीने उष्माघात उपचार कक्ष कार्यान्वित केले आहेत. मार्च महिन्यात दोनदा झालेल्या अवकाळी पावसानंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. उष्माघाताचा त्रास होणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. जरंडी, बनोटी व सावळदबारा या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. एकूण ८ बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. शहरातील आपला दवाखाना' येथेही लवकरच असा कक्ष सुरू केला जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीतेश चावडा यांनी दिली. उन्हाचा पारा वाढल्याने सोयगाव बसस्थानकासमोरील रस्त्यावर वाहनांची रहदारी कमी होत असल्याची स्थिती आहे. चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, स्नायूंना गोळे येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, उलट्या, थकवा, श्वासोच्छ्वास वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे. शरीराचे तापमान १०५ अंश फॅरेनहाइटपर्यंत पोहोचणे. ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे आहेत. रुग्णांसाठी एसी, कूलर आणि पंख्यांची स्वतंत्र व्यवस्था. ओआरएस, आयव्ही फ्लुइड्स, तातडीची औषधे आणि डिजिटल थर्मामीटर, रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी कोल्ड पॅक्स, थंड पाणी आणि बर्फाची उपलब्धता करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांकडून ग्राहकांसाठी पाण्याची सोय उन्हाचा तडाखा वाढल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी स्वखर्चातून ग्रीन नेट'(हिरवे कापड) लावून कृत्रिम सावली केली आहे. तसेच ग्राहकांसाठी पिण्याच्या शुद्ध व थंडगार पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. उष्माघात रुग्ण आढळल्यास काळजी घ्या ^तापमान वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. उष्माघाताचा रुग्ण आढळल्यास त्याला त्वरित सावलीत बसवून शरीरावर थंड पाणी टाकावे. प्रकृती गंभीर वाटल्यास विलंब न करता रुग्णालयात दाखल करावे. याठिकाणी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. -डॉ. दिनाजी खंदारे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, सोयगाव
घाटनांद्रा राज्य महामार्ग क्रमांक ४०वरील घाटनांद्रा-सिल्लोड मार्गालगत वाहणाऱ्या चारणा नदीची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून सांडपाणी व कचऱ्याच्या विळख्यात सापडलेल्या नदीचे अक्षरशः गटारात रूपांतर झाले आहे. नदीपात्रात साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर तातडीने नदीची स्वच्छता करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. गावातील सांडपाणी थेट नदीमध्ये सोडले जात असल्याने तसेच काही नागरिकांकडून सर्रास कचरा टाकला जात असल्याने नदी प्रदूषणाच्या गर्तेत अडकली आहे. प्लास्टिक, प्राण्यांचे अवशेष, अंड्यांची टरफले यामुळे नदीचे स्वरूप कचराकुंडीप्रमाणे झाले आहे. परिणामी, कचऱ्यात साचलेल्या पाण्यातून कुबट वास येत असून परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या नदीवर उभारण्यात आलेल्या चारनेर लघु प्रकल्पामुळे चारनेर, आमठाणा, पेंडगाव, घाटनांद्रा वाडी या गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होत असला तरी सध्या वाढलेल्या प्रदूषणामुळे भविष्यात जलसाठा दूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यास हेच दूषित पाणी तलावात मिसळून परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात डासांचे प्रमाणही वाढले असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी नदीपात्राची स्वच्छता करावी, अशी मागणी दामोदर मोरे, संतोष गुळवे, संजय गुळवे, योगेश ज्ञाने, सुनील मोटे, कृष्णा मोरे यांच्यासह परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. ग्रामस्थांनीही स्वच्छतेबाबत सहकार्य करावे ^चारणा नदीतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असून याकडे ग्रामपंचायतीचे लक्ष आहे. लवकरच नदीपात्राची स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच सांडपाणी व्यवस्थापनासाठी योग्य उपाययोजना करण्याचे नियोजन सुरू आहे. ग्रामस्थांनीही स्वच्छतेबाबत सहकार्य करावे. - प्रभाकर धुड, ग्रामविकास अधिकारी
नाट्यपरंपरा जपण्यासाठी कटिबद्ध- राजेंद्र पाथ्रीकर:76 वर्षांची नाट्य, कुस्तीची परंपरा पाथ्रीत कायम
फुलंब्री तालुक्यातील पाथ्री गावाच्या इतिहासात कुस्ती आणि नाट्यकला यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ही ७६ वर्षांची गौरवशाली परंपरा बदलत्या काळात आजही कायम आहे. यासाठी आवश्यक ते सर्व पाठबळ पुरवण्यात येईल. धावपळीच्या युगात माणसे जोडणाऱ्या या कला जिवंत राहणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राजेंद्र पाथ्रीकर यांनी केले. पाथ्री गावातील यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आयोजित नाट्यकलावंतांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या वर्षी यात्रा उत्सवात सावकार' हे नाटक यशस्वीरीत्या सादर करण्यात आले. या नाटकातील कलाकारांचा गौरव करण्यात आला. गावातील जुनी नाट्यपरंपरा जिवंत ठेवणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचाही शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कलेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दामूअण्णा पाथ्रीकर, भानुदास पाथ्रीकर, अंकुश मोहनराव बनसोड, कचरू तात्या, रशीद शेठ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विजय ढेपले यांनी केले. योगेश बनसोड यांनी सूत्रसंचालन केले.
प्रतिनिधी | लासूर स्टेशन सिरेसायगाव (ता. गंगापूर) येथील शेतकरी शिवसिंग बेडवाल यांच्या विहिरीत शुक्रवारी सकाळी बिबट्या आढळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, पण रेस्क्यू पथकाने सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद केले. घटनेची माहिती शेतकरी रवी वाघ यांनी पंचायत समिती सदस्य शुभम बोऱ्हाडे यांना दिली. बोऱ्हाडे यांनी तातडीने वन विभाग प्रशासनाला कळवले. सहकारी सुनील जाधव, गणेश गव्हादे, कल्याण जाधव, पंकज आमराव यांच्यासह ते घटनास्थळी पोहोचले. वन विभागाचे परिमंडळ अधिकारी अनिल पाटील, वनरक्षक के. व्ही. ब्रह्मनावत, शेळके यांच्यासह कर्मचाऱ्यांचे रेस्क्यू पथक दाखल झाले. सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. बिबट्याला गौताळा अभयारण्यात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. घोसल्यात कुत्र्याची शिकार सोयगाव | घोसला शिवारातील ज्ञानेश्वर युवरे यांच्या शेताजवळ (गट क्र. ८०) बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांसह मजुरांची मोठी पळापळ झाली. या बिबट्याने रात्री एका कुत्र्याची शिकार केल्याचे गुरुवारी सकाळी उघड झाले. महावितरणने शेतातील सिंगल फ्यूज वीज बंद केल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
उंडणगाव लघु प्रकल्पामध्ये युवकाचा मृतदेह आढळला:पोहण्याचा मोह नडला, 22 तास शोधमोहीम
सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव लघु प्रकल्पात पोहण्यासाठी गेलेला १५ वर्षीय रितेश नंदकिशोर गिरी पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. माहितीनुसार, खुल्लोड येथील रितेश दुपारी मित्रांसोबत उंडणगाव प्रकल्पावर पोहण्यासाठी गेला होता. रितेशला पोहता येत नव्हते. तरीही तो पाण्यात उतरला. पोहण्याचा प्रयत्न करताना तो खोल पाण्यात गेल्याने बुडाला. संध्याकाळपर्यंत रितेश घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. तो तलावाकडे गेल्याचे समोर आले. घटनास्थळी त्याचे कपडे, चप्पल आढळली. गावकऱ्यांनी पाण्यात उतरून शोधकार्य सुरू केले. रात्रीपर्यंत काहीच मागमूस लागला नव्हता. शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. २२ तासांच्या शोधानंतर शुक्रवारी दुपारी रितेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. रितेशचे कुटुंब अत्यंत गरीब आहे. आई-वडील मामाच्या गावी स्थायिक झाले होते. मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाले. सायंकाळी सात वाजता खुल्लोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रितेशच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार असल्याची माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांनी समंजस भूमिका घ्यावी- तहसीलदार वगवाड:सिद्धनाथ वाडगावात महाराजस्व अभियान शिबिर
सिद्धनाथ वाडगाव (ता. गंगापूर) येथे शुक्रवारी महसूल मंडळ विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर झाले. याला शेतकरी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी शिल्लेगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सविता संतोष पाटील जाधव होत्या. आयोजक तहसीलदार नवनाथ वगवाड, प्रशिक्षणार्थी तहसीलदार श्री. वाघमारे, गंगापूर भूमीअभिलेखचे उपअधीक्षक श्री. इंपाळे उपस्थित होते. तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी शेतकऱ्यांना वहिवाट, बांध, शीवरस्ते यासारख्या वादाचे प्रसंग सोडवावेत. शेतकऱ्यांनी समंजस भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. वजनापूरचे सरपंच शिवम जाधव यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या. पंचायत समिती सदस्या मोहिनी जगदीश साळुंके, वजनापूर-शेकटा गावचे युवा सरपंच शिवम अंकुश जाधव, मालुंजाचे सरपंच जगदीश साळुंके, तांदुळवाडीचे सरपंच अनिल राजगिरे, पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष जब्बार पटेल, शिल्लेगावचे महसूल अधिकारी सुनील सरगर, लासुरचे शंकर जाधव आदी उपस्थित होते. शिबिरात उपस्थित शेतकऱ्यांना वारस कारवाई, सातबारा, संजय गांधी, श्रावण बाळ मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.
हनुमाननगर चौकात हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या दिवेकर आणि रांजणे गँगच्या ८ गुंडांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (१६ एप्रिल) रात्री झालेल्या या राड्यानंतर पोलिस त्यांच्या मागावर होते. या कारवाईत एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. सार्वजनिक कार्यक्रमातील जुन्या वादातून या दोन्ही गँगमध्ये धुसफूस सुरू होती. गुरुवारी दुपारी न्यायनगर भागात त्यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर रात्री दोन्ही गट हनुमाननगर चौकात आमने-सामने आले. या वेळी पवन दिवेकर याने हवेत गोळीबार केल्याने परिसरात खळबळ माजली होती. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेत घटनास्थळावरून एक काडतूस जप्त केले होते. अटकेतील आरोपींची नावे पवन अनिल दिवेकर (३०, रा. एमएसईबी क्वार्टर, मिल कॉर्नर), कुणाल किशोर साळवे (२६, रा. न्यायनगर, गारखेडा), महेश गौतम साळवे (३०, रा. संसारनगर, क्रांती चौक), रोहन अनिल दिवेकर (२४, रा. एमएसईबी क्वार्टर, मिल कॉर्नर), सतीश अण्णाराव हिवराळे (२३, रा. समतानगर, क्रांती चौक), सिद्धार्थ शाहू चाबुकस्वार (२१, रा. न्यायनगर, गारखेडा), नीलेश ऊर्फ सूर्या नारायण रांजणे (रा. न्यायनगर), आकाश साळुंखे (रा. हनुमाननगर) दुसऱ्या गुंडाकडून पैसे घेऊन चहा पीत असताना पोलिसांच्या बेड्या दिवेकर रात्रभर शहरातील कुख्यात गुंडच्या संपर्कात होता. तो शहराच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या ठिकाणावर तो असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. मात्र तो सातत्यने आपले लोकेशन बदलत होता. त्याने बाबा पेट्रोल पंप परिसरात राहणाऱ्या एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीकडून पुढे पळून जाण्यासाठी पैसे घेतले. त्यानंतर पहाटे पैठण गेट भागातील एका टपरीवर तो चहा पिताना पोलिसांना दिसला. साध्या वेशातील पोलिस ओळखून दिवेकर याने लागलीच पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा पाठलाग करून अखेर अर्जून राऊत यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या.
सुमारे १८ लाख लोकसंख्येच्या शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी १८ पोलिस ठाणी, ३५०० पोलिस कार्यरत आहेत. असे असताना मात्र मागील काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर पोलिसांचे नव्हे तर गुंडांचे राज्य असल्याचे दिसून येत आहे. कारण मागील सात दिवसांत एका खुनासह १४ चाकूहल्ल्यांची पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली. त्याशिवाय मंगळसूत्र चोरीचे ६, विनयभंगाचे ५ गुन्हे दाखल झाले. २ ठिकाणी गोळीबाराच्या घटना तर सरकारी कामात अडथळा आणल्याचे २ गुन्हे नोंदवले आहेत. रस्त्यावर समोरून येणारा चाकूने मारेल, गळ्यातील सोने हिसकावून पळेल अथवा त्याचा विश्वास संपादन करून लुटेल याची भीती निर्माण झाली आहे. पोलिसांची पेट्रोलिंग पूर्ण अपयशी ठरली असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आल्याने प्रचंड दहशतीचे व पोलिसांवरील अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात भररस्त्यात रक्ताचे सडे पडत आहेत, गोळीबाराच्या फैरी झडत आहेत. तर आडोशाला उभ्या व्यक्तीला लुटण्याच्या उद्देशाने थेट चाकूचे वार झेलावेद लागत आहेत. पोलिसांच्या वतीने ऑल आऊट ऑपरेशन आणि कोम्बिंग ऑपरेशन अनेक दिवसांपासून बंद दप्तरात गेले आहे. त्यामुळे पोलिसांनी कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी कंबर कसण्याची गरज आहे. माध्यमावर ‘रील्स’मधून गुंडांची दहशत एकीकडे रस्त्यावर गुंडांचा नाच सुरू असताना, दुसरीकडे सराईत गुन्हेगार सोशल मीडियावरही धुमाकूळ घालत आहेत. हातात धारदार शस्त्रे घेऊन, तलवारी नाचवत आणि पोलिसांना खुलेआम आव्हान देणाऱ्या रील्स बनवून समाज माध्यमावर टाकल्या जात आहेत. हर्सूल जेल परिसरातील, कोर्टात सादर करतानाचे तसेच हातकडी घातलेले भाईगिरीचे हे व्हिडिओ आहेत. या डिजिटल गुंडांवर ठोस कारवाई होत नसल्याने पोलिसांचे सायबर मॉनिटरिंग केवळ देखावाच ठरत आहे. खबऱ्यांचे नेटवर्क; सराईतांवर लक्ष देण्यात अपयश कुठलाही सराईत गुन्हेगार तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याच्यावर नजर ठेवण्याची गरज असते. मात्र पोलिस यात अपयशी ठरत आहेत. तसेच पूर्वी असणारे खबऱ्यांचे नेटवर्क आता अस्तित्वात नसल्याचे दिसून येत आहे. सराईत गुंड बाहेर येताच त्यांचा जेलच्या बाहेरच सत्कार केला जातो. फटाके फोडले जातात, त्यांची रॅली काढली जाते, तरी त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. ‘चार्ली’ प्रयोगाची पुन्हा एकदा गरज शहरात अमितेश कुमार पोलिस आयुक्त असताना त्यांनी २०१५-२०१७ या काळात दलातील काही कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र चार्ली पथक स्थापन केले होते. त्यांच्यामार्फत २४ तास शहरात दुचाकीवरून गस्त घातली जायची. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण होऊन गुन्हेगारी घटली होती. त्यामुळे नागरिक पुन्हा एकदा अशा प्रयोगाची मागणी करत आहेत.
मित्रांमध्ये फुशारकी मिरवण्यासाठी अधिकाधिक मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचे, त्यानंतर त्यांच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन करायचे आणि त्याचे व्हिडिओ काढायचे, अशा प्रकाराचा उलगडा परतवाड्यात झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अयान अहमद तन्वीर अहमद याला अटक केली आहे. अयानचा एक “लव्ह गुरू’ होता. त्याने त्याला मुलींना जाळ्यात ओढण्याच्या काही क्लृप्त्या शिकवल्या. “मुलींना पटवण्यासाठी “हाय-हॅलो’ असे जनरल मेसेज करायचे नाहीत. त्यांना असा प्रश्न विचार, ज्याचे उत्तर द्यायला त्या भाग पडतील,” उदाहरणादाखल, “आप वहीं हो ना जो वहां मिले थे?” अशा प्रकारचे प्रश्न विचारून अयान मुलींना आपल्यासोबत चॅटिंग करण्यास भाग पाडत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आल्याचे सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणात अयानने एकूण आठ मुलींसोबत गैरवर्तन केले असून त्यातील दोघींवर लैंगिक अत्याचार केल्याचेही समोर आले आहे. लैंगिक अत्याचारासाठी त्याने अमरावती शहरातील एका मित्राच्या फ्लॅटचा वापर केला. गेल्या वर्षभरात तो सात ते आठ वेळा मुलींना त्या ठिकाणी घेऊन गेल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात अयानला फ्लॅट उपलब्ध करून देणाऱ्या मानव सुगंधे यालादेखील पोलिसांनी गुरुवारी (16 एप्रिल) अटक केली आहे. मानव सुगंधे आणि अयान यांची थेट ओळख नव्हती. पीयूष नावाच्या एका तरुणाच्या माध्यमातून अयान हा मानवच्या संपर्कात आला होता. पीयूष आणि मानव पूर्वी संबंधित फ्लॅटवर रूम पार्टनर म्हणून राहत होते. मात्र काही काळानंतर पीयूषने तो फ्लॅट सोडला होता. पीयूषची अयानसोबत आधीपासून ओळख असल्याने, जेव्हा अयानने फ्लॅटबाबत विचारणा केली, तेव्हा पीयूषने त्याला मानवशी संपर्क साधण्यास सांगितले. यानंतर अयान मानवच्या संपर्कात आला. प्रत्येक वेळी 500 रुपये देऊन तो फ्लॅटमधील खोलीचा वापर या कृत्यांसाठी करत होता. भाजप नेत्या नवनीत राणा यांना दंगली घडवायच्यात : प्यारे खान नागपूर |अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. नवनीत राणा यांना दंगली घडवायच्या असून त्यांनी पसरवलेल्या अफवांमुळे त्यांच्यावर पोक्सोअंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत असल्याचे खान यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, नवनीत राणा यांनी या प्रकरणातील आरोपींचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली होती. त्याला प्यारे खान यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. परतवाड्यात 3 कॅफेमध्येही चाळे अयानने काही मुलींसोबत अमरावती शहरातील दोन कॅफे आणि परतवाडा येथील तीन कॅफेमध्येही अश्लील वर्तन केले होते. पोलिस आता या पाचही कॅफेंचा शोध घेत आहेत. त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी आपली चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक केली आहे. पोलिस कोठडीत त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. तपासाअंती आरोपींच्या संख्येत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन साखळ्या अटक केलेल्या आठ आरोपींपैकी अयान हा मुख्य सूत्रधार आहे. मानव सुगंधे हा फ्लॅट उपलब्ध करून देणारा आहे. उर्वरित सहा आरोपी आक्षेपार्ह व्हिडिओ एकाकडून दुसऱ्याला व्हायरल करणारे आहेत. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन साखळ्या पोलिसांनी समोर आणल्या आहेत. पहिल्या साखळीत अयानकडून सर्वप्रथम त्याचा जिवलग मित्र उजेर खान याने व्हिडिओ मिळवले. ते पुढे मो. साद याला पाठवले. मो. सादने ते तरबेज खानला पाठवले. दुसरी साखळी अशी आहे. उजेर खानने ऐफाज खानला पाठवले. ऐफाजने मोहंमद इम्रानला पाठवले. त्याने शेख नावेदला पाठवले. ही साखळी अद्याप संपलेली नाही. अमरावतीतील व्हिडिओ कांड अयानला फ्लॅट उपलब्ध करून देणाऱ्या मानव सुगंधे यालादेखील पोलिसांनी गुरुवारी (16 एप्रिल) अटक केली आहे. मानव सुगंधे आणि अयान यांची थेट ओळख नव्हती. पीयूष नावाच्या एका तरुणाच्या माध्यमातून अयान हा मानवच्या संपर्कात आला होता. पीयूष आणि मानव पूर्वी संबंधित फ्लॅटवर रूम पार्टनर म्हणून राहत होते. मात्र काही काळानंतर पीयूषने तो फ्लॅट सोडला होता. पीयूषची अयानसोबत आधीपासून ओळख असल्याने, जेव्हा अयानने फ्लॅटबाबत विचारणा केली, तेव्हा पीयूषने त्याला मानवशी संपर्क साधण्यास सांगितले. यानंतर अयान मानवच्या संपर्कात आला. प्रत्येक वेळी 500 रुपये देऊन तो फ्लॅटमधील खोलीचा वापर या कृत्यांसाठी करत होता.
नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या ११ जणांना भरपाई देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारवर संताप व्यक्त केला. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांनी ४ मेपर्यंतची शेवटची मुदत दिली आहे. रक्कम न मिळाल्यास छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल. तसेच, विलंबासाठी प्रतिदिन प्रति लाभार्थी १,००० रुपये दंड त्यांच्या स्वतःच्या खिशातून वसूल केला जाईल, असा कडक इशारा न्यायालयाने दिला आहे. धोरणासाठी २ महिन्यांचा वेळ हवा राज्य सरकारने नवीन सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी २ महिन्यांचा वेळ मागितला आहे. त्यावर धोरणात केवळ सरकारी तिजोरीवर भार न टाकता संबंधित दुकानांची तपासणी करणाऱ्या निरीक्षकांवरही जबाबदारी निश्चित करावी, असे कोर्टाने म्हटले.
खरातच्या अटकेला एक महिना; 9 गुन्हे, 58 क्लीप, 130 खाती:नाशिक ते अहिल्यानगरपर्यंत 16 गुन्हे दाखल
स्वतःला देवाचा अवतार भासवून महिलांचे लैंगिक शोषण आणि व्यावसायिकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा पाय पूर्णपणे खोलात गेला आहे. १७ मार्च रोजी नाशिक गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्यानंतर तपासाचे चक्र वेगाने फिरले असून, आतापर्यंत त्याच्यावर एकूण १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये नाशिकमधील सरकारवाडा, मुंबई नाका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, राहता येथील गुन्ह्यांचा समावेश आहे. तपासातील धक्कादायक बाबी रिमोट कंट्रोल नाग : भक्तांना घाबरवण्यासाठी २० फुटांचा नाग रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने फिरवत असे.कस्तुरीचा वापर : फसवणुकीसाठी तो दुर्मिळ जडीबुटी आणि हरिणाची कस्तुरी वापरून चमत्कारचा बनाव.राजकीय कनेक्शन : खरातच्या आश्रमात अनेक बड्या नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची उठबस असल्याचे फोटो समोर.पत्नीचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू.एसआयटी-आता या प्रकरणाचा मुळापासून तपास करत असून खरातच्या मालमत्तेचा आकडा ५०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता.
भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्यावर सक्तवसुली संचालनालयाने आपला फास अधिक घट्ट केला आहे. कॅनडा कॉर्नर परिसरातील खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर’ या कार्यालयावर शुक्रवारी ईडी आणि एसआयटीच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या मॅरेथॉन झाडाझडतीनंतर पथकाने कार्यालयातून महत्त्वपूर्ण दस्तऐवज आणि बंद पाकिटांमधील पुरावे बॅगा भरून जप्त केले आहेत. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ईडीचे पथक अचानक कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात धडकले. यावेळी स्थानिक एसआयटीचे अधिकारीही सोबत होते. कार्यालयाचे दरवाजे आतून बंद करून प्रत्येक फाईल आणि संगणकीय डेटाची बारकाईने तपासणी करण्यात आली. खरातने फसवणुकीतून कमावलेली मालमत्ता आणि त्याचे आर्थिक धागेदोरे कोणापर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास या कारवाईत करण्यात आल्याचे समजते.कारवाई पूर्ण झाल्यानंतर पथकाने सर्व जप्त केलेले साहित्य सीलबंद करून सोबत नेले. तपास पूर्ण होताच ‘ओकस’च्या कार्यालयाला पुन्हा एकदा प्रशासनाकडून अधिकृत सील ठोकण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरातील बड्या संशयितांचे आणि खरातच्या निकटवर्तीयांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, खरात याने सामान्य नागरिकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे. या पैशांची गुंतवणूक रिअल इस्टेट आणि हवाला नेटवर्कद्वारे परराज्यात व परदेशात केल्याचा संशय आहे. निकटवर्तीयांची मालमत्ता जप्तीची प्रक्रिया शक्य भोंदू कॅप्टन अशोक खरातने सर्वसामान्यांची फसवणूक करून जमवलेली मालमत्ता आता ईडीच्या कचाट्यात समोर आली आहे. आजच्या कारवाईनंतर जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमुळे खरातच्या बेनामी संपत्तीचे अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. ओकस प्रॉपर्टीजच्या माध्यमातून नाशिकसह जिल्ह्यात कुठे कुठे जमिनी खरेदी केल्या, याचा शोध आता ईडी घेत आहे. आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे मिळाल्यास खरात आणि त्याच्या निकटवर्तीयांची बँक खाती तसेच मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले आहे.
नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिच्या अटकेसाठी एसआयटीची ३ पथके मागावर आहेत. शुक्रवारी दुपारी पोलिसांनी तिचा पती मोईन खान याला मुंब्र्यातून ताब्यात घेत ४ तास कसून चौकशी केली. निदा गरोदर असून ‘लोकेशन’ बदलून ती पोलिसांना सातत्याने गुंगारा देत आहे. दरम्यान, प्रकरणाच्या तपासात आता एटीएसचीही एंट्री झाली असून एटीएसने नातेवाईक पसार; फोन ‘स्विच ऑफ’ मोईन मुंब्र्यातील एका लॉजिस्टिक कंपनीत कार्यरत असून पोलिसांनी त्याला कामावरूनच ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिस निदा लपलेल्या नातेवाइकांच्या घरी पोहोचले. मात्र, पोलिस पोहोचण्यापूर्वीच ते नातेवाईक घर बंद करून पसार झाले. त्यांचे मोबाईलही ‘स्विच ऑफ’ असल्याने पोलिसांच्या हाती निराशा लागली. गरोदरपणाचे कारण सांगत सहानुभूतीचा प्रयत्न २६ वर्षीय निदा टीसीएसमध्ये २०२१ पासून एचआर मॅनेजर होती. या रॅकेटची ती ‘मास्टरमाईंड’ असल्याचा आरोप आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी दाबल्याचा आरोप असून, ९ एप्रिल रोजी तिला कंपनीने बडतर्फ केले आहे. सध्या तिने गरोदरपणाचा आणि एफआयआरमध्ये ‘केवळ धार्मिक भावना दुखावल्याचा’ ठपका असल्याचा आधार घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. ॲक्सिस बँकेतही अशा केसे- अमृता फडणवीस मी ॲक्सिस बँकेत असताना अशा केसेस माझ्यासमोर झाल्या आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले आहे. नाशिकच्या टीसीएस बीपीओ कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय शिकवणे सक्तीचे केले असले तरी अनेक शाळा या नियमाची पायमल्ली करत आहेत. याची अत्यंत गंभीर दखल घेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी शासन निर्णय जारी केला. यापुढे मराठी भाषा अनिवार्यपणे न शिकवणाऱ्या शाळेला १ लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. तसेच, नियमाचे पालन न करणाऱ्या शाळांची मान्यता किंवा ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ रद्द केले जाईल. ‘इंग्रजी’ माध्यमाच्या आणि सीबीएसई शाळांना बसणार चाप! इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये अजूनही ‘मराठी’ भाषा विषय गांभीर्याने शिकवला जात नाही, अशा अनेक तक्रारी आहेत. या नवीन नियमावलीमुळे आणि थेट १ लाखाच्या दंडाच्या तरतुदीमुळे आता सीबीएसई, आयसीएसई आणि आंतरराष्ट्रीय मंडळांच्या शाळांना चाप बसेल. राज्यात एकूण खाजगी शाळांत मंडळाच्या १३,५३८, सीबीएसईच्या १,२६० आणि आयसीएसईसह इतर ३८९ शाळांचा समावेश आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी अखेर खुली
अमेरिकेने मानले इराणचे आभार, संघर्ष निवळणार? तेहरान : वृत्तसंस्था अमेरिका आणि इराणमध्ये २८ फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात झाली होती. हे युद्ध तब्बल ३९ दिवस चालले. अखेर ४० व्या दिवशी अमेरिका आणि इराणकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, युद्धकाळात इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज जहाजांसाठी बंद केल्याने जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले होते. मात्र, आता इराणने होर्मुझची […] The post होर्मुझची सामुद्रधुनी अखेर खुली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर, मोदी सरकारला धक्का नवी दिल्ली : वृत्तसंस्था नारी शक्ती वंदन अधिनियम (१३१ वी घटनादुरुस्ती) आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर देशाच्या संसदेत काल जोरदार चर्चा झाली. त्यानंतर शुक्रवारीही सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांनी या विधेयकावर मते मांडली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी यावर मतदान पार पडले. यावेळी एकूण ५२८ सदस्यांनी मतदान केले. यापैकी २९८ […] The post मोदी सरकारची फजिती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणे आता केवळ सक्तीचेच नाही, तर अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून, थेट शाळेची मान्यता रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. राज्याच्या भाषा धोरणानुसार मराठी भाषेचे अध्यापन सर्व शाळांना बंधनकारक आहे. मात्र, काही आंतरराष्ट्रीय आणि खासगी शाळांमध्ये मराठी विषय शिकविला जात नसल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत शासनाने आज एक नवीन आदेश जारी केला आहे. यानुसार, केवळ राज्य मंडळाच्याच (SSC) नव्हे, तर सीबीएससी (CBSE), आयसीएसई (ICSE), आयबी (IB) आणि आयजीसीएसई (IGCSE) यांसारख्या सर्व परकीय आणि इतर मंडळांच्या शाळांनाही मराठी विषयाचे अध्यापन करणे बंधनकारक असेल. पात्र शिक्षकांची नियुक्ती आणि विशेष तपासणी पथके नवीन आदेशानुसार, प्रत्येक शाळेत मराठी विषयासाठी स्वतंत्र आणि पात्र शिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक राहणार आहे. या नियमाची अंमलबजावणी केवळ कागदावर राहू नये, यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि निरीक्षकांचे विशेष पथक तयार करण्यात येणार असून, यामध्ये मराठी विषयातील तज्ज्ञ शिक्षकांचा समावेश असेल. हे पथक शाळांना आकस्मिक भेटी देऊन मराठी विषयाच्या तासांची आणि शिकविण्याच्या पद्धतीची तपासणी करेल. शाळा सुरू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल शिक्षण संचालकांकडे सादर करणे आता बंधनकारक आहे. १ लाख रुपयांचा दंड आणि मान्यता रद्द शाळांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास प्रशासन अत्यंत कठोर पावले उचलणार आहे. दोषी आढळलेल्या शाळा व्यवस्थापनाला प्रथम नोटीस देऊन १५ दिवसांत खुलासा मागविण्यात येईल. जर शाळेचे उत्तर समाधानकारक नसेल, तर महाराष्ट्र स्वंयअर्थसहाय्यित शाळा अधिनियमातील कलम १२(१) नुसार संबंधित शाळेला एक लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. दंडात्मक कारवाईनंतरही जर शाळेने मराठी विषय शिकविण्यास सुरुवात केली नाही, तर अंतिम कारवाई म्हणून त्या शाळेची मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा डॉ. पंकज भोयर यांनी दिला आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाला मिळणार बळ कोणतीही शिक्षण संस्था किंवा शाळा महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा अवमान करू शकत नाही. ही आमची राजभाषा असून तिचे संवर्धन करणे हे प्रत्येक शाळेचे कर्तव्य आहे, असेही डॉ. भोयर यांनी यावेळी स्पष्ट केले. शासनाच्या या धडाकेबाज निर्णयामुळे राज्यातील मराठी भाषेच्या सक्तीच्या अंमलबजावणीला मोठे बळ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असून, पालकांमधूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे.
अनैतिक संबंधातून महिलेला बॅटने मारहाण करुन तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातीत चंदननगर भागात घडली. या प्रकरणी एका वकिलासह, त्याची पत्नी आणि मुलीला अटक करण्यात आली आहे. पूनम दिनेश मुन (वय ३२, रा. गणेशनगर, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ‘या प्रकरणी वकील ॲड. संजय सावंत, त्यांची पत्नी स्वाती आणि मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पूनमचे पती दिनेश यांनी फिर्याद दिली आहे’, अशी माहिती चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश बडाख यांनी दिली. ॲड. सावंत यांचे पूनमशी प्रेमसंबंध होते, ॲड. सावंत यांचे चंदननगर भागातील जुन्या मुंढवा रस्त्यावर कार्यालय आहे. पूनम गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. सावंत यांच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून काम करत होती. गुरुवारी (१६ एप्रिल) सकाळी ती नेहमीप्रमाणे ॲड. सावंत यांच्या कार्यालयात गेले. त्यानंतर ॲड. सावंत, त्याची पत्नी स्वाती आणि मुलीने तिला बॅटने मारहाण केली. तिच्यावर शस्त्राने वार केले. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात ठेवण्यात आला. रात्री आठपर्यंत पूनम घरी न परतल्याने तिच्या पतीने ॲड. सावंत यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा पूनम मैत्रिणीकडे गेल्याचे सांगण्यात आले. पतीने तिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, मोबाइल बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पूनमचे पती शुक्रवारी सकाळी ॲड. सावंत यांच्या कार्यालयात गेले. तेव्हा कार्यालयाचा दरवाजा उघडा होता. पूनम रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्यानंतर पूनमच्या पतीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पूनमच्या पतीने माहिती दिल्यानंतर पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, गु्न्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, नूतन पवार, पोलिस निरीक्षक निलेश बडाख यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. चंदननगर पोलिसांनी ॲड. सावंत आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले, तसेच गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ॲड. सावंत यांची पत्नी स्वाती हिला ताब्यात घेतले. खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सहा तासात गुन्ह्याचा छडा लावला. पोलिस निरीक्षक बडाख, खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक राम राजमाने आणि पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.
छत्रपती संभाजीनगर शहरात महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. शुक्रवारी (१७ एप्रिल) शहरातील सुमारे २० टक्के भागात ४ ते ६ तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून सध्या मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या कामांमध्ये शहरातील ११ केव्ही आणि ३३ केव्ही वाहिन्यांच्या संपर्कात येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे हे मुख्य काम होते. २ ते ३ किलोमीटर अंतरावरील फीडरमधील झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. यासोबतच जंप काढणे आणि लूज कनेक्शन दुरुस्त करणे यांसारखी तांत्रिक कामेही करण्यात आली. कार्यकारी अभियंता महेंद्र देशमुख आणि प्रसाद महातोले यांनी ही माहिती दिली. शहरातील विविध भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत भीमटेकडी फीडर आणि दिल्लीगेट फीडरवरील अंबर हिल, एव्हरेस्ट कॉलेज, सईदा कॉलनी, हर्सूल गाव, कोलथनवाडी रोड, जहांगीर कॉलनी, चेतनानगर आणि फातेमा कॉलनी येथे वीज नव्हती. याचप्रमाणे, सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पडेगाव उपकेंद्रावरील सर्व फीडर, निशांत पार्क फीडर आणि रेल्वे स्टेशन फीडरवरील उद्योग इंद्रकमल, स्काय सिटी, निशांत पार्क परिसर, मास्टर कुक हॉटेल, दिशानगरी, झेड गॅलेक्सी, शिवकला नेत्रालय, द्वारकादास नगर, शहानूरवाडी आणि समाधान कॉलनी येथील वीजपुरवठा बंद होता. रेल्वे स्टेशन उपकेंद्रावरील सर्व फीडर्सवरील ग्राहकांना सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत वीज खंडित झाल्याचा अनुभव आला. तर, सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत म्हाडा कॉलनी, चिकलठाणा गाव, सावित्रीनगर, विमानतळासमोरील भाग, प्रकाशनगर, रामनगर, नारेगाव, एन-११, एन-१२, एन-१, पॉवरलूम, ग्रीव्हज, सिंधी कॉलनी, उस्मानपुरा, एसबीएच कॉलनी आणि विकासनगर येथे वीज नव्हती.
पुण्यातील बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सत्तू अमावस्येच्या दिवशी या उत्सवाला सुरुवात झाली. यावर्षी तब्बल २५ लाख विविध सुवासिक फुलांनी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही मनोहारी फुलांची आरास पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली. या पुष्पोत्सवासाठी जाई, जुई, मोगरा, लिली, शेवंती, सोनचाफा, तगर, निशिगंध यांसारख्या शोभिवंत फुलांची आरास करण्यात आली आहे. मोगऱ्याच्या फुलांचा पोशाख आणि गुलाब, झेंडू, चाफा यांसारख्या फुलांनी मंदिराला सुशोभित करण्यात आले. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही फुलांची भव्य आरास साकारली. उत्सवाच्या सुरुवातीला सकाळी उत्सव उपप्रमुख अक्षय हलवाई यांच्या हस्ते पारंपरिक लघुरूद्र करण्यात आला. त्यानंतर अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार आणि उत्सवप्रमुख महेंद्र पिसाळ यांच्या हस्ते श्रीमती लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंकाळी प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व माजी विश्वस्त डॉ. विठ्ठल नेउरगांवकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी कार्यकारी विश्वस्त अॅड. रजनी उकरंडे, खजिनदार युवराज गाडवे, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, सुनिल रुकारी, डॉ. पराग काळकर आणि राजेंद्र बलकवडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाविकांना चैत्र महिन्यातील विशेष प्रसाद म्हणून कैरीची डाळ आणि पन्हे वाटप करण्यात आले. श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, श्रीमत् वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज, श्रीमाणिकप्रभू महाराज या दत्तमहाराजांच्या चार अवतारांच्या प्रतिमा तसेच कै. लक्ष्मीबाई आणि दगडूशेठ हलवाई यांच्या प्रतिमा देखील फुलांनी सजविण्यात आल्या आहेत. ही फुलांची आरास रविवार, २१ एप्रिलपर्यंत भाविकांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणलेले महिला आरक्षण विधेयक (संविधान १३१ वी दुरुस्ती विधेयक) लोकसभेत नामंजूर झाले आहे. यावरून आता राजकीय युद्ध पेटले असून, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. राक्षसी बहुमताच्या जोरावर लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव आज फसला आहे, अशा शब्दांत वडेट्टीवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच महिला आरक्षणाला काँग्रेसचा विरोध नाहीये. पण मोदींच्या छुप्या अजेंड्याला विरोधच राहील, असेही वडेट्टीवार म्हणाले. लोकसभेत या विधेयकावर ऐतिहासिक मतदान झाले. एकूण ५२८ खासदारांनी मतदानात भाग घेतला होता. घटनेनुसार, हे विधेयक मंजूर होण्यासाठी उपस्थित सदस्यांच्या दोन-तृतीयांश बहुमताची म्हणजेच ३५२ मते गरज होती. विधेयकाच्या बाजूने २९८ मते, तर विरोधात २३० मते पडली. अखेर ३५२ हा जादुई आकडा गाठण्यात सरकार अपयशी ठरल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयक नामंजूर झाल्याचे घोषित केले. डेलिमिटेशनचा छुपा डाव? विजय वडेट्टीवार यांनी या विधेयकाच्या नावाखाली सुरू असलेल्या 'राजकारणा'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, महिला आरक्षणाच्या बहाण्याने भाजपला मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) रेटून न्यायची होती. यामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील राज्यांची स्वायत्तता धोक्यात आली असती. मात्र, देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांनी अत्यंत विवेकबुद्धीने मतदान करून राज्यांवरील हे संकट टळले आहे. काँग्रेसचा आरक्षणाला नव्हे, विभाजनाला विरोध सोशल मीडिया पोस्टद्वारे भूमिका मांडताना विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, महिला आरक्षणाचा मुद्दा सर्वात आधी काँग्रेसनेच मांडला होता. आमचा महिलांच्या आरक्षणाला विरोध नाही. पण महिलांच्या आडोशाने देशाला दोन भागांत विभागण्याचा जो नरेंद्र मोदींचा डाव होता, त्याला आमचा विरोध होता आणि यापुढेही राहील, असे त्यांनी निक्षून सांगितले. ओबीसी महिलांच्या रोषाचा इशारा भाजपने या विधेयकात ओबीसी महिलांना आरक्षण नाकारल्याचा आरोपही विजय वडेट्टीवारांनी केला आहे. देशातील महिला आधीच महागाई, शिक्षण आणि सुरक्षेच्या प्रश्नांनी होरपळत आहेत. त्यातच भाजपने ओबीसी महिलांना आरक्षण नाकारून त्यांचा अपमान केला आहे. याचा रोष महाराष्ट्रासह देशभर भाजपला सहन करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. 'खोटे बोलू नका'; १६ एप्रिलच्या नोटिफिकेशनचा दिला दाखला विजेय वडेट्टीवार यांनी सरकारचे एक नोटिफिकेशन शेअर करत भाजपच्या दाव्यांमधील हवा काढून घेतली. जे लोक महिला आरक्षण मिळणार नाही म्हणून गळे काढत आहेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी. महिलांसाठीचे ३३% आरक्षण हे १६ एप्रिल २०२६ पासून तांत्रिकदृष्ट्या लागू झाले आहे. सरकारला फक्त त्याची अंमलबजावणी कशी करायची, हे ठरवायचे आहे. त्यामुळे भाजपचे समर्थन करायचे असेल तर करा, पण लोकांशी खोटे बोलू नका, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
देशाच्या संसदेत आज महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून अभूतपूर्व राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सादर केलेले 'संविधान १३१ वी दुरुस्ती विधेयक २०२६' (नारी शक्ती वंदन अधिनियम) लोकसभेत आवश्यक तांत्रिक बहुमताअभावी नामंजूर झाले. घटनादुरुस्तीसाठी उपस्थित सदस्यांच्या दोन-तृतीयांश मतांची आवश्यकता असते, मात्र संख्याबळ न जुळल्याने हे ऐतिहासिक विधेयक रखडले आहे. या निकालावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर कडाडून हल्लाबोल केला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला लोकशाहीतील 'काळा दिवस' संबोधले आहे. लोकसभेत या विधेयकावर मतविभाजनाद्वारे मतदान घेण्यात आले. ५२८ खासदारांनी या प्रक्रियेत भाग घेतला होता. हे विधेयक मंजूर होण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमत म्हणजेच ३५२ मतांची आवश्यकता होती. विधेयकाच्या बाजूने २९८ मते पडली, तर विरोधात २३० मते मिळाली. बहुमतासाठी ५४ मतांची कमतरता भासल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयक नामंजूर झाल्याचे घोषित केले. यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सीमांकन आणि केंद्रशासित प्रदेश कायद्याशी संबंधित इतर दोन विधेयके तूर्तास पुढे न नेण्याचा निर्णय घेतला. विरोधकांनी नारीशक्तीचा अपमान केला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधेयक नामंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, देशातील महिलांना आरक्षण मिळावे ही आमची बांधिलकी आहे, पण विरोधकांनी केवळ राजकीय अहंकारासाठी या ऐतिहासिक संधीचा बळी दिला. नारीशक्तीच्या बाजूने उभे राहण्याऐवजी विरोधकांनी 'नौटंकी'ला प्राधान्य दिले. भारताची नारीशक्ती हा अपमान विसरणार नाही. आम्ही केवळ भाषणांमध्ये महिला सक्षमीकरण मानत नाही, तर ती आमची श्रद्धा आहे. या अन्यायाविरोधात आम्ही उद्यापासून रस्त्यावर उतरून जनआंदोलन करू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. लाडक्या बहिणींचे रौद्र रूप दिसेल: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालावर ट्विट करत महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. आजचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. काँग्रेस आणि इंडी (I.N.D.I.A.) आघाडीने गरीब, दलित आणि आदिवासी माता-भगिनींना संसदेत जाण्यापासून रोखले आहे. पंतप्रधान मोदींनी महिलांना न्याय देण्याचा ऐतिहासिक प्रयत्न केला, पण विरोधकांचा महिलांप्रती असलेला आकस आज उघड झाला आहे. आता येणाऱ्या काळात विरोधकांना आमच्या लाडक्या बहिणींचे रौद्र रूप पाहायला मिळेल, असा इशारा शिंदे यांनी दिला. सभागृहात रंगला 'कलगीतुरा' मतदानापूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सरकारकडून पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी विधेयकाचे महत्त्व पटवून दिले. तर दुसरीकडे राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव, अमोल कोल्हे आणि वर्षा गायकवाड यांनी विधेयकातील तरतुदींवर प्रश्न उपस्थित करत विरोध दर्शवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाद्वारे २०२९ च्या निवडणुकांपासून लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्याचा एक ऐतिहासिक आणि क्रांतीकारी प्रयत्न केंद्र सरकारने केला. मात्र, दुर्दैवाने राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू आणि अनाठायी भूमिकेमुळे या विधायक प्रयत्नात अडसर आल्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. महिला आरक्षणासंदर्भातील घटना दुरुस्ती विधेयके दोन-तृतियांश बहुमताने मंजूर न झाल्याबाबत प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक शंकेला केंद्र सरकारने अत्यंत वस्तुनिष्ठ आणि ठोस उत्तरे दिली. विरोधी पक्षांची मागणी असेल तर सर्व राज्यांमध्ये सरसकट ५० टक्के याच प्रमाणात लोकसभा मतदारसंघ वाढवण्याबाबतची सकारात्मक तयारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात व्यक्त केली होती. मात्र, एकूणच विरोधी पक्षांची भूमिका पाहता त्यांना देशातील कोट्यवधी महिलांच्या हितांपेक्षा स्वतःचा राजकीय अहंकार अधिक महत्त्वाचे वाटल्याचे दिसून येते. महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीत अडसर आणणे, हा विरोधी पक्ष कदाचित आपला विजय समजत असतील. प्रत्यक्षात तो नारीशक्तीच्या हितांचा आणि त्यांच्या हक्कांचा पराभव आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळवून देणे, हा आमच्यासाठी केवळ राजकीय अजेंडा नसून तो एक दृढ निर्धार आणि स्वप्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आज ना उद्या हे स्वप्न निश्चितपणे साकार होईल आणि भारतीय नारीशक्तीला तिचा हक्क मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला. ५४ मतांच्या फरकाने हे विधेयक नामंजूर दरम्यान, महिला आरक्षण विधेयकाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर करून घेण्यात सरकारला अपयश आले. '१३१ वे घटनादुरुस्ती विधेयक, २०२६' मध्ये एकूण जागांची संख्या वाढवून ८५० करण्याच्या तरतुदींचा समावेश होता. २१ तास चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर या विधेयकावर मतदान झाले. विधेयकाच्या बाजूने २९८, तर विरोधात २३० मते पडली. लोकसभेत एकूण ५२८ संसद सदस्यांनी (खासदारांनी) आपला मतदानाचा हक्क बजावला. विधेयक मंजूर होण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती. ५२८ च्या दोन-तृतीयांश म्हणजे ३५२ मते होय. परिणामी, ५४ मतांच्या फरकाने हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. आपल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात, मोदी सरकारला सभागृहात एखादे विधेयक मंजूर करून घेण्यात अपयश येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
वर्धा जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले असले, तरी मंगळवार व बुधवारपासून तापमानात वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी १६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील १,४५४ शाळा व १,६२७ अंगणवाडी एकूण ३,०८१ शाळांना सुट्टी जाहीर केली होती. शुक्रवारी तापमान चक्क ४४.४ अंश सेल्सिअस वर पोहचले असताना, शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र गुरुवारी ४४ तापमानात सुट्टी देण्याच्या निर्णयामागे नेमका उद्देश काय, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, शहरालगतच्या एका शाळेच्या ग्रुपमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यामुळे एक दिवसाची सुट्टी असा मजकूर व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर हा संदेश झपाट्याने पसरल्यानंतर शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले की, सुट्टी ही केवळ वाढत्या तापमानामुळे देण्यात आली आहे. तरीही नागरिकांच्या मनातील शंका मात्र कायम आहेत. ४४ तापमान असताना सुट्टी, पण ४४.४ असताना सुट्टी नाही वर्धा जिल्ह्यात इंग्रजी माध्यमासह प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये केजी-१ ते दहावीपर्यंतचे वर्ग नियमित भरविले जातात. सकाळीच १० वाजताच्या सुमारास उष्णतेची तीव्रता जाणवत असताना लहान मुलांना होणाऱ्या त्रासाकडे प्रशासनाने वेळेवर गांभीर्याने पाहिले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. १७ एप्रिल रोजी तापमान ४४.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना त्या दिवशी मात्र सुट्टी जाहीर करण्यात आली नाही, हेही विशेष ठरत आहे. मुलांच्या आरोग्यापेक्षा राष्ट्रपतींच्या ताफ्याच्या सोयीसाठी होता का? याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान मंत्र्यांचा ताफा शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींच्या हद्दीतून जाणार असल्याने कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठीच शाळांना सुट्टी देण्यात आली का? अशी चर्चा रंगत आहे. प्रशासनाचा निर्णय मुलांच्या आरोग्यापेक्षा ताफ्याच्या सोयीसाठी होता का? हा मुद्दा आता केंद्रस्थानी आला आहे. राज्याचे शिक्षण राज्यमंत्रीही या दौऱ्यावर उपस्थित असल्याने, सुट्टीच्या आदेशामागे त्यांचे काही निर्देश होते का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. वाढत्या उष्णतेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासन जागे होईल की निद्रा अवस्थेत राहील याकडे लक्ष वेधले जात आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (ITI) शहीद हेमंत करकरे यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कौशल्य विकास विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर अधिकाऱ्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यात येत असून, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. येत्या रविवारी १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी दहा वाजता कामठी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, मुंबईतल्या २६/११च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले हेमंत करकरे हे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) प्रमुख होते. त्यांचे बलिदान भारतीय विसरू शकत नाहीत. शहीद करकरे यांचे धैर्य, नेतृत्वगुण आणि परमोच्च देशसेवेच्या सन्मानार्थ आयटीआयचे नामकरण करण्यात येत असल्याचे त्यांनी भावूक होत सांगितले. या नामकरणामुळे कामठी येथील आयटीआय संस्थेची ओळख अधिक प्रेरणादायी ठरणार असून, येथील विद्यार्थी करकरे यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन कौशल्य विकासासोबतच राष्ट्रसेवेची भावना जोपासतील, असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला आहे. या समारंभात शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण ही करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची संकल्पना मांडताना थोर भारतीय विचारवंत, समाजसेवक आणि शहीदांचा योग्य सन्मान करण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. या संकल्पनेला पुढे नेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विभागाने राज्यातील आयटीआयचे महान विभूतींच्या नावाने नामकरण करण्याचा राज्यव्यापी कार्यक्रम घेतला असल्याची माहितीही यावेळी मंत्री लोढा यांनी दिली. दरम्यान, या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, या कार्यासाठी मेहनत घेणारे कौशल्य विभागाचे कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही मंत्री लोढा यांनी आभार मानले आहेत.
नाशिकमधील एका आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरण करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, यावेळी त्यांनी आपल्या बँकिंग क्षेत्रातील कारकिर्दीतील एक खळबळजनक आठवण शेअर केली आहे. मी जेव्हा ॲक्सिस बँकेत कार्यरत होते, तेव्हा माझ्यासमोरही महिला शोषणाची अशी प्रकरणे घडली होती, असा मोठा दावा त्यांनी यावेळी केला. अमृता फडणवीस यांना कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. नाशिकच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, कॉर्पोरेट क्षेत्रात अशा घटना घडत असल्याचे पाहून मला खूप खेद वाटतो. मी जेव्हा बँकेत होते, तेव्हा माझ्यासमोर अशी काही प्रकरणे आली होती. काही पुरुषांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन स्त्रियांना त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या प्रकरणांची तक्रार झाल्यानंतर वरिष्ठांनी तात्काळ संबंधितांवर कठोर कारवाई केली होती. अशा घटना घडल्यानंतर त्या लपवून न ठेवता वरिष्ठांना सांगणे गरजेचे आहे, तरच हे प्रकार थांबतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'लव्ह जिहाद' रोखण्यासाठी संस्कृतीचे शिक्षण हवे धर्मांतरण आणि लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकरणांवर भाष्य करताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, ही प्रकरणे अतिशय भयानक आहेत. आपल्या मुलींनी या बाबतीत सतर्क राहणे आवश्यक आहे. जर आपण आपल्या संस्कृतीवर मनापासून प्रेम केले, तर अशा घटनांना आळा बसेल. आजचे तरुण सध्या संभ्रमात आहेत, कारण त्यांना आपल्या पुराण आणि वेदांची पुरेशी माहिती नाही. आपण त्यांना भारतीय संस्कृतीवर आधारित शिक्षण दिले पाहिजे, जेणेकरून ते भरकटणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. भोंदू अशोक खरातला कडक शिक्षा व्हावी नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरही त्यांनी संताप व्यक्त केला. खरातने आपली बुद्धी आणि व्यक्तिमत्त्वाचा वापर महिलांचे शोषण करण्यासाठी केला, हे अतिशय दुःखद आहे. या प्रकरणात सध्या कडक कारवाई सुरू आहे. प्रत्येक स्त्रीची हीच मागणी आहे की, अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हायलाच हवी, असे अमृता फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. 'नारीशक्ती वंदन' कायद्याचे स्वागत संसदेत चर्चेत असलेल्या महिला आरक्षण विधेयकावर (नारीशक्ती वंदन कायदा) बोलताना त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आभार मानले. हा कायदा पारित व्हावा ही प्रत्येक महिला आणि पुरुषाची इच्छा आहे. राजकारणात महिलांची टक्केवारी वाढणे काळाची गरज आहे. स्त्रियांना समान संधी मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. पंतप्रधान महिलांचे भले करण्यासाठी जे पाऊल उचलत आहेत, त्यात कोणताही स्वार्थ नसून तो महिलांचा हक्क आहे, असे त्यांनी नमूद केले.
पुणे ग्रोथ हब आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिले. नीती आयोग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा आढावा त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. संबंधित विभागांनी वारंवार बैठका घेऊन अंतिम आराखडा सादर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातून राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि सल्लागार कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते. डॉ. नितीन करीर यांनी यावेळी सांगितले की, पुणे ग्रोथ हबमुळे स्टार्टअप, आयटी आणि उत्पादन क्षेत्रात मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रकल्पांचे पुणे आर्थिक क्षेत्रासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन लक्षात घेऊन सर्वसमावेशक नियोजन करावे. प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांशी सविस्तर बैठका घेऊन प्रत्येक विभागाचा भविष्यातील दृष्टीकोन, गरजा व प्राधान्यक्रम समजून या कामाला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीत सादरीकरणाद्वारे प्रकल्पांची एकूण प्रगती, पूर्ण झालेले टप्पे आणि आर्थिक व जीवनमान निर्देशांकांची निर्मिती यावर माहिती देण्यात आली. उत्पादन, पायाभूत सुविधा, संपर्क आणि नागरी विकास या क्षेत्रांवरील सखोल अभ्यास व अंमलबजावणीचा दृष्टीकोन स्पष्ट करण्यात आला. आर्थिक, जीवनमान, शाश्वतता व समावेशकता यांवर आधारित डेटा-आधारित नियोजन, ११ क्षेत्रांमध्ये ५० हून अधिक शासकीय बैठका व ८० हून अधिक खाजगी क्षेत्र संवादाद्वारे व्यापक सल्लामसलत, प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रकल्पांची ओळख, शासन-खाजगी भागीदारी व गुंतवणूक नियोजनावर भर आणि एकात्मिक प्रादेशिक नियोजनावर विशेष लक्ष यावरही प्रकाश टाकण्यात आला.
ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरांच्या वाढत्या विजेच्या गरजेनुसार महावितरण आणि महापारेषण कंपन्यांना वीज विकासाचा बृहत आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हा आराखडा तयार करताना महानगरपालिका आणि महावितरणने समन्वय साधावा, असेही त्यांनी सूचित केले. नवीन वीज उपकेंद्रांसाठी आवश्यक जागा मिळवण्यासाठी स्थानिक आमदारांची मदत घ्यावी, जेणेकरून जागेचे प्रश्न लवकर मार्गी लागून नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यमंत्री बोर्डीकर यांनी गणेशखिंड येथील प्रकाशभवन येथे पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरातील वीज समस्यांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीला महापौर मंजुषा नागपूरे, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार शंकर जगताप, आमदार योगेश टिळेकर, आमदार अमित गोरखे यांच्यासह महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे (पुणे) व धर्मराज पेठकर (बारामती), महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोलप तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत स्थानिक आमदारांनी भूमिगत वीज वाहिन्यांचा प्रश्न प्राधान्याने मांडला. भूमिगत वाहिन्यांसाठी लागणाऱ्या खोदाई शुल्काचा मुद्दा यावेळी ऐरणीवर आला. भूमिगत वाहिन्यांच्या खर्चापेक्षा खोदाई शुल्काचा खर्च चौपट अधिक असल्याने नवीन कामांसाठी मिळालेला बहुतांश निधी खोदाई शुल्कातच खर्च होत आहे, ज्यामुळे कामे कमी प्रमाणात होत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये प्रति मीटर १०० रुपये शुल्क आकारून महावितरणला रस्ते पूर्ववत करण्याच्या अटीवर परवानगी मिळते. याच धर्तीवर पुणे महानगरातही खोदाई शुल्क आकारण्याची मागणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केली. यावर राज्यमंत्री बोर्डीकर यांनी पुणे महानगरपालिकेनेही पिंपरी-चिंचवडप्रमाणे शुल्क आकारण्याची सूचना केली. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत ३० लाखांहून अधिक वीज ग्राहक आहेत. शहराच्या वाढीनुसार ग्राहकांची संख्या वाढत असल्याने वीज वाहिन्या अतिभारित होत आहेत आणि बिघाड वारंवार घडत आहेत. अशावेळी वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी रस्त्याच्या बाजूने स्वतंत्र 'भूमिगत मार्गिका' सोडावी, अशी मागणी महावितरणने केली. यामुळे बिघाड झाल्यास वाहिन्या बदलण्यासाठी तातडीने उपाययोजना करता येतील, असे महावितरणने म्हटले. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने हे आवश्यक असल्याने आमदारांनीही या मागणीला संमती दिली. महावितरण आणि महापारेषणच्या विविध चालू योजनांचा आढावा घेताना राज्यमंत्री बोर्डीकर यांनी यंत्रणांना कामाची गती वाढवण्याचे निर्देश दिले. बांधकामांना परवानगी देतानाच विकसकांकडून उपकेंद्र आणि फिडर पिलरसाठी जागा आरक्षित करावी, यासाठी आवश्यक नियम तयार करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. तसेच, स्थानिक प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी विषय समित्याही विनाविलंब स्थापन कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
राम नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून एक नैसर्गिक परिसंस्था आहे, ज्यात सजीव आणि निर्जीव घटक परस्परांवर अवलंबून असतात. पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या राम नदीच्या अस्तित्वाचा, ऐतिहासिक तथ्यांचा तसेच पर्यावरणीय, जीवशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय दृष्टीने अभ्यास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पी. व्ही. पी. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राध्यापक आर्किटेक्ट देवेंद्र देशपांडे यांनी केले. कोहिनूर कट्टा आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (१७ डिसेंबर) पी. व्ही. पी. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी राम नदीवर केलेल्या अभ्यासावर दृक्-श्राव्य व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रा. देशपांडे बोलत होते. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यावेळी उपस्थित होते. या महोत्सवाचा समारोप १९ डिसेंबर रोजी होणार असून, त्यावेळी नागरी समस्या निवारण समिती, भूगाव यांना कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते ‘राम नदी सेवक सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. प्रा. आर्किटेक्ट देवेंद्र देशपांडे यांनी सांगितले की, राम नदी ही एक ऋतुस्रावी नदी असून ती खाटपेवाडीपासून भूकुम, भूगाव, बावधन, पाषाण, बाणेरमार्गे मुळा नदीला मिळते. या नदीला ऐतिहासिक महत्त्व असून तिच्या तिरावर मानवी वस्ती आणि नैसर्गिक अधिवास आढळल्याच्या नोंदी आहेत. विद्यार्थ्यांनी नदीचा जीवशास्त्रीय आणि सांस्कृतिक घटकांच्या माध्यमातून अभ्यास केला. यात नदीतील झरे, नैसर्गिक स्रोत, जैवविविधता आणि भूजल भांडार यांचा समावेश होता. या अभ्यासात विद्यार्थ्यांनी नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचाही सखोल अभ्यास केला. भारतीय समाजमनानुसार नदी हे सामाजिक घडामोडींचे आणि मानवी बदलांचे केंद्रस्थान असते. त्यामुळे नदीच्या तिरावरील बांधकामे, त्यांच्या पद्धती आणि रस्त्यांचा विस्तार याविषयीची माहितीही संकलित करण्यात आली. शहरीकरणामुळे राम नदी अत्यंत दुर्लक्षित राहिली असून, त्यामुळे निसर्गचक्राची मोठी हानी झाली आहे. नदी परिसरात अतिक्रमणे आणि बेकायदेशीर बांधकामे रोखण्यासाठी शासन व्यवस्थेने जागृत राहणे आवश्यक आहे, असे प्रा. देशपांडे म्हणाले. विद्यार्थ्यांनी राम नदीच्या दुरवस्थेला कारणीभूत अनेक घटकांचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला आहे. प्रदर्शने आणि पथनाट्याच्या माध्यमातून ते समाजजागृतीचा प्रयत्न करत आहेत.
वीज प्रश्नावरून महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन
परभणी : मागील काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांमध्ये दिवसा व रात्री विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्रीच्या वेळी अनेकवेळा वीज गूल होत असल्याने प्रभाग १५मधील नागरिकांच्या झोपेचे खोबरे होत आहे. सध्या शाळा, महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू असून विजेअभावी विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. नागरिकांच्या या प्रश्नाची दखल घेत भारतीय […] The post वीज प्रश्नावरून महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री पाटील यांनी सहकार क्षेत्राची ताकद वाढवण्यासाठी प्रशिक्षण हाच उत्तम पर्याय असल्याचे सांगितले. नफा कमावणाऱ्या सहकारी संस्थांना नाममात्र शुल्क आकारून प्रशिक्षण देण्यासाठी सहकार विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे येथे हा उद्घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रविण दरेकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, आमदार सुनील कांबळे, सहकार आयुक्त दिपक तावरे, राज्य सहकारी संघाचे संचालक संजीव कुसाळकर आणि शिवाजीराव नलावडे उपस्थित होते. मंत्री पाटील यांनी प्रशिक्षणासाठी चांगली वास्तू आणि उत्तम वातावरण आवश्यक असल्याचे नमूद केले. प्रशिक्षणाच्या खर्चासाठी निधीच्या काटेकोर नियोजनाचा आराखडा तयार करावा. शिक्षण निधी वजा करून येणारी तूट पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये सादर केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले. राज्यात सहकार विद्यापीठ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. सध्या तरी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये सहकार विभाग सुरू करून त्या-त्या विद्यापीठांमध्ये सहकार विषयाचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रविण दरेकर म्हणाले की, संघाला १०० वर्षांची परंपरा आहे. सहकार क्षेत्राला उर्जितावस्था आणण्यासाठी सहकारी संघ बळकट करणे आवश्यक आहे. राज्यातील सहकार चळवळीला योग्य दिशा देण्यासाठी संस्थांमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे आणि सहकारी संस्थांनी सामाजिक दायित्व जपले पाहिजे. दरेकर यांनी शासनाकडे काही मागण्या केल्या. राज्यातील अडीच लाख सहकारी संस्थांना हक्काचे प्रशिक्षण केंद्र देण्यासाठी सुसज्ज प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, सहकारी संघांचा बंद झालेला शिक्षण निधी पुन्हा सुरू करण्याची विनंतीही त्यांनी केली. सहकार चळवळीला सशक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या पाठबळाने निश्चित गती देण्यात येईल, असे दरेकर यांनी सांगितले. राज्यातील सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला ताकद देण्याचे काम करण्यात येईल. त्यासाठी शासनाने राज्यातील सहकाराचे पालकत्व घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आरोग्य सेवेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आयोजित केलेल्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या दोन दिवसीय राष्ट्रीय ‘चिंतन शिबिरा’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील कुमार बर्नवाल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन, एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे राज्य मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण उपस्थित होते. देशातील विविध राज्यांतील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ व धोरणकर्ते, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी झाले होते. राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले की, प्रतिबंध हाच आजार टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे, त्यामुळे आरोग्य विभाग प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देत आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे आरोग्य क्षेत्रात मोठे बदल होत असून, त्याचा उपयोग नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी केला जात आहे. महाराष्ट्र हे मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. जानेवारीपासून सुरू झालेल्या या क्लिनिकचा १७ हजारांहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे. या चिंतन शिबिराचा उपयोग पुढील दिशा ठरवण्यासाठी निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. बर्नवाल यांनी नमूद केले की, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे नागरिकांचा आरोग्य सेवेवरील स्वतःच्या खिशातून होणारा खर्च लक्षणीयरित्या कमी झाला आहे. या योजनेतून आतापर्यंत ११ कोटींहून अधिक रुग्णांवर उपचार झाले आहेत. एआयसारखे उदयोन्मुख तंत्रज्ञान गंभीर आरोग्य आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करू शकते. आरोग्य क्षेत्रात एआयच्या वापरासाठी राष्ट्रीय धोरण विकसित केले जात असून, ते आरोग्य सेवेमध्ये सर्वसमावेशक वापरासाठी मार्गदर्शन करेल. शिबिराच्या पहिल्या दिवशी एबीपीएमजेएवाय व एबीडीएम अंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. की-परफॉर्मन्स इंडिकेटर्स (केपीआय), क्लेम्स डेटावर आधारित विश्लेषण, तसेच डिजिटल हेल्थ सुविधांची सादरीकरणे यामध्ये समाविष्ट आहेत. महाराष्ट्रासह झारखंड, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांकडून त्यांच्या डिजिटल हेल्थ मिशनच्या अनुभवांवर सादरीकरण करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी आयटी अपडेट्स, एनएचसीएक्स सक्षम एचएमआयएस प्रणालीचे प्रात्यक्षिक, हेल्थ डेटा अॅनालिटिक्स युनिटचे निष्कर्ष सादर केले जाणार आहेत. यासोबतच एम्सद्वारे विकसित क्लिनिकल डिसिजन सपोर्ट सिस्टीमच्या अंमलबजावणीवर विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच पीएमजेएवाय आयटी प्लॅटफॉर्मवरील विविध योजनांचे एकत्रीकरण, पीएम-राहत उपक्रम आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एबीडीएमची अंमलबजावणी यावरही सविस्तर चर्चा होणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आरोप-प्रत्यारोपामुळे जिल्ह्याची सामाजिक आणि राजकीय प्रतिमा डागाळली जात आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे या दोघांनाही जिल्ह्यातून तडीपार करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या मागणीसाठी वंचितच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी केल्याने जिल्हा प्रशासनासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार संजय गायकवाड आणि विजयराज शिंदे यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. मात्र, हा वाद आता राजकीय धोरणांवरून न राहता वैयक्तिक आणि अतिशय गंभीर आरोपांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे जिल्ह्यात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बुलढाणा ही राजमाता जिजाऊंची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते, मात्र या नेत्यांच्या 'वैचारिक प्रदूषणामुळे' जिल्ह्याची बदनामी होत आहे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली आहे. 'वंचित'चा एल्गार; प्रशासनाला साकडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. सामान्य गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करणारे प्रशासन, जिल्ह्याची शांतता भंग करणाऱ्या या बड्या नेत्यांवर मेहेरबानी का करत आहे? असा सवाल यावेळी विचारण्यात आला. जिल्ह्याची बदनामी थांबवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या दोन्ही नेत्यांना तातडीने जिल्ह्यातून बाहेर काढावे (तडीपार करावे), असे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. नेमके प्रकरण काय? आमदार संजय गायकवाड आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेले आरोप हे केवळ राजकीय नसून ते गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत. विजयराज शिंदे यांनी अनेक मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. इतकेच नव्हे तर एका अल्पवयीन मुलीचा अवैध गर्भपातही केल्याचा खळबळजनक आरोप संजय गायकवाड यांनी केला असून, आपल्याकडे शासकीय अहवालासह सर्व पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. संजय गायकवाड यांनी केलेले आरोप विजयराज शिंदे यांनी फेटाळून लावलेत. आमदारांनी माझाच नाही तर आदिवासी आणि मागासवर्गीय महिलांचा अवमान केला आहे, असे म्हटले आहे. याप्रकरणी गायकवाड यांनी माफी न मागितल्यास १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला आहे. हे ही वाचा… प्रवीण दरेकर होणार पुढचे 'सहकार मंत्री':चंद्रकांत पाटलांच्या विधानाने चर्चांना उधाण, विरोधकांच्या कर्जबाजारीपणाच्या टीकेलाही प्रत्युत्तर राज्याच्या राजकारणात अर्थ खात्यानंतर आता 'सहकार' खात्यावरूनही मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, प्रवीण दरेकर यांच्या नावासमोरचा केवळ 'कॅबिनेट दर्जा' हा शब्द जाऊन ते लवकरच पूर्णवेळ सहकार मंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. पाटील यांच्या या विधानामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात सहकार खात्यावर भाजपचा डोळा असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. सविस्तर वाचा…
परभणी जिल्ह्यात चार दिवस येलो अलर्ट
परभणी : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्यासाठी दि. १७ ते २० एप्रिल या चार दिवसांकरीता येलो अलर्ट जारी केला आहे. दि. १७ एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून दि. १८ एप्रिल रोजीही उष्मालाट राहण्याची शक्यता आहे. दि. १९ व २० एप्रिल रोजी जिल्ह्यात ताशी ३० ते […] The post परभणी जिल्ह्यात चार दिवस येलो अलर्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्याच्या राजकारणात अर्थ खात्यानंतर आता 'सहकार' खात्यावरूनही मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, प्रवीण दरेकर यांच्या नावासमोरचा केवळ 'कॅबिनेट दर्जा' हा शब्द जाऊन ते लवकरच पूर्णवेळ सहकार मंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. पाटील यांच्या या विधानामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात सहकार खात्यावर भाजपचा डोळा असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी उपरोक्त विधान केले आहे. तसेच यावेळी त्यांनी स्वतःचा किस्सा सांगत सहकार क्षेत्रातील आगामी बदलांची माहिती दिली. नेमके काय म्हणाले चंद्रकांत पाटील? चंद्रकांत पाटील यांनी प्रवीण दरेकर यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक केले. ते म्हणाले, प्रवीणजींच्या नावासमोर सध्या कॅबिनेट दर्जा आहे, पण आमची प्रार्थना आहे की हा केवळ 'दर्जा' शब्द लवकरात लवकर जावा आणि त्यांना प्रत्यक्ष सहकार मंत्रिपद मिळावे. या विधानाने सभागृहात कुजबुज सुरू होताच, पाटील यांनी मिश्किलपणे सावरून धरले की, भाषणात ओघाओघाने असं बोलावं लागतं. अमित शाहांचा 'तो' किस्सा आणि सहकार खाते सहकार मंत्री म्हणून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, अमित शाह यांच्यामुळेच मी आधी आमदार आणि नंतर मंत्री झालो. त्यांनीच मला पहिले सहकार खाते दिले. त्यावेळी माझी साधी सहकारी संस्थाही नव्हती. मी त्यांना विचारले की मलाच हे खाते का? तेव्हा शाह म्हणाले, तुमच्या स्वतःच्या संस्था नाहीत, म्हणूनच तुम्हाला हे खाते दिले आहे, जेणेकरून तुम्ही निष्पक्षपणे काम करू शकाल. स्वतंत्र सहकार विद्यापीठाची घोषणा सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यात लवकरच एक स्वतंत्र 'सहकार विद्यापीठ' निर्माण करण्यात येईल. तसेच, राज्यातील इतर विविध विद्यापीठांमध्ये 'सहकार' नावाचे स्वतंत्र विभाग सुरू केले जातील, अशी महत्त्वाची घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला कामासाठी हवा तेवढा निधी दिला जाईल, त्यांनी फक्त ठोस प्रस्ताव पाठवावेत, अशी ग्वाही त्यांनी दिली. देवेंद्र फडणवीसांचे 'त्या' फाईलसाठी प्रयत्न आमदार सुनील कांबळे यांच्या सहकार सूत गिरणीचा संदर्भ देत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. कांबळे यांच्या गिरणीची फाईल मंजूर व्हावी यासाठी देवेंद्रजींनी संपत आलेली कॅबिनेट बैठक केवळ त्या कामासाठी लांबवली आणि फाईल मंजूर करून घेतली, असे सांगत त्यांनी सरकारमधील समन्वयाचे उदाहरण दिले. कर्जबाजारीपणाची टीका चुकीची, राज्याचा GDP भक्कम राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. विरोधक कितीही टीका करत असले तरी राज्य सरकार कर्जबाजारी नाही. राज्याचा जीडीपी (GDP) अत्यंत चांगला असून परिस्थिती नियंत्रणात आहे, असे ते म्हणाले.
सिंगापूरच्या कौशल्य विद्यापीठाच्या धर्तीवर राज्यात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने आगामी वर्षापर्यंत ५० ठिकाणी शाखा सुरू कराव्यात. तसेच या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकरीची हमी मिळेल अशा स्वरूपाची विद्यार्थ्यांची तयारी सिंगापूरच्या कौशल्य विद्यापीठाच्या धर्तीवर तयार करून घ्यावी असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. एल्फिस्टन तांत्रिक विद्यालयाच्या मध्यवर्ती रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी मंत्री लोढा बोलत होते. या कार्यक्रमाला रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, राज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्त डॉ. अमित सैनी, राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकांत पाटील, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सुर्यवंशी, आयुषचे नॅशनल रिसर्च प्रोफेसर प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यावेळी उपस्थित होते. मंत्री लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण नवीन शैक्षणिक धोरणातून 'कौशल्यावर आधारित' शिक्षण देत आहोत. राज्यात मुख्यमंत्री महाफंड योजनेअंतर्गत तीन टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेतून राज्यात २ लाख उद्योजक घडविणार आहोत आणि ५० हजार स्टार्टअप्सपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे., निवडक स्टार्टअप्सना सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. राज्यातील ४१७ आयटीआयमध्ये मुख्यमंत्री महाफंड योजनेतून उद्योजक घडविण्यासाठी आयटीआयजवळ जागा उपलब्ध करून दिली जाईल. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कामाला सन्मान यामुळे मिळेल.आपण एक कुटुंब आहोत, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शासन पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभे आहे असेही ते म्हणाले. मंत्री लोढा म्हणाले की, सिंगापूरच्या प्रगतीचे रहस्य त्यांच्या 'एज्युकेशनल रिफॉर्म्स' आणि 'स्किल डेव्हलपमेंट'मध्ये दडलेले आहे. तिथल्या अर्थव्यवस्थेचा कणा शिक्षण आणि तंत्रज्ञान आहे. सिंगापूरमध्ये जिथे केवळ २५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती देणारे प्रकल्प उभे राहतात. तिथे १०० टक्के रोजगाराची हमी दिली जाते. आपल्यालाही महाराष्ट्रात हेच 'सिंगापूर मॉडेल' कौशल्य विकासाच्या माध्यमातून आणायचे आहे. यावेळी आयडिशेन कॉम्पिटिशन सहित विविध स्पर्धातील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. राजेश तलवारे यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत, 'सर्वोत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.
यंदा मान्सूनच्या काळात देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची दाट शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागाने सोमवारी आपला पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला. त्यानुसार नैऋत्य मान्सून हंगामात देशभरात ९२ टक्के पाऊस पडू शकतो. मान्सूनमध्ये देशात साधारणतः ८७ सेमी पाऊस पडतो, मात्र यंदा ८० सेमी पावसाचा अंदाज आहे. यंदाचा मान्सून अंदाज हा २००१ पासूनच्या अंदाज प्रक्रियेनंतरचा सर्वात कमकुवत प्रारंभिक अंदाज आहे. त्यामुळे महागाईची टांगती तलवार कायम आहे. सोबतच अर्थवाढीवर परिणाम होण्याची शक्यता एसबीआय म्युचुअल फंडच्या ताजा अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. SBI Mutual Fund च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ नम्रता मित्तल यांनी तयार केलेल्या अहवालानुसार, IMD केवळ ‘सरासरीपेक्षा कमी’, ‘सरासरी इतका’ आणि ‘सरासरीपेक्षा जास्त’ अशा श्रेणींमध्येच अंदाज व्यक्त करते. ९० ते ९५ टक्के पर्जन्यमान ‘सरासरीपेक्षा कमी’ मानले जाते, तर ९६ ते १०४ टक्के ‘सरासरी इतका’ श्रेणीत येते. अंदाज, प्रत्यक्षात फरक अहवालात नमूद केल्याप्रमाणे, काही वर्षांत IMD च्या अंदाज आणि प्रत्यक्ष पर्जन्यमानामध्ये फरक दिसून आला आहे. उदाहरणार्थ, २००६ आणि २००७ मध्ये अंदाज ‘सरासरीपेक्षा कमी’ असताना प्रत्यक्ष पर्जन्यमान अनुक्रमे ‘सरासरी इतका’ आणि ‘सरासरीपेक्षा जास्त’ राहिले. तर २०१४ आणि २०१५ मध्ये अंदाजानुसारच पर्जन्यमान कमी राहिले. एल निनोचा संभाव्य प्रभाव अहवालानुसार, जुलै २०२६ पर्यंत एल निनो स्थिती विकसित होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम मान्सूनच्या उत्तरार्धात दिसू शकतो. सकारात्मक इंडियन ओशन डायपोल (IOD) परिस्थिती अनुकूल असली तरी एकूण परिणाम कमकुवत मान्सूनकडे झुकणारा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. “२००० नंतरच्या ५ पैकी ४ एल निनो वर्षांमध्ये पर्जन्यमान ‘सरासरीपेक्षा कमी’ किंवा ‘अपुरे’ राहिले आहे,” असे मित्तल यांनी नमूद केले. खरीप हंगामावर परिणाम मान्सूनमधील कमतरतेचा परिणाम खरीप हंगामावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. धरणांमध्ये पाणीसाठा चांगला असला तरी तो पूर्णतः संरक्षण देऊ शकत नाही. “धरणांतील पाणीसाठा समाधानकारक असला तरी तो खरीप उत्पादनातील घसरण पूर्णपणे रोखू शकत नाही,” असे मित्तल यांनी स्पष्ट केले. इतिहासातही मान्सून कमकुवत राहिल्यास शेती उत्पादनात घट किंवा स्थिरता दिसून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. महागाईवरील परिणाम अहवालानुसार, अन्नमहागाईचा मान्सूनशी थेट संबंध कमी असून ती विविध घटकांवर अवलंबून असते. “अन्नमहागाईचा मान्सूनशी थेट संबंध कमी असून ती इतर अनेक घटकांवर अवलंबून असते,” असे मित्तल यांनी नमूद केले. २०२६ मध्ये महागाई तुलनेने जास्त राहण्याची शक्यता असून, त्यामागे प्रतिकूल बेस इफेक्ट हा एक महत्त्वाचा घटक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालात कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतार, हवामानाशी संबंधित अडथळे आणि पुरवठा साखळीतील समस्या यांसारख्या घटकांमुळे महागाई वाढण्याचा धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, हे घटक अद्याप ग्राहक किंमत निर्देशांकात स्पष्टपणे दिसून आलेले नाहीत. निष्कर्ष एकूणच, मान्सूनचा प्रारंभिक अंदाज कमकुवत असला तरी त्याचा शेती, महागाई आणि आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम पुढील काळातील विविध घटकांच्या घडामोडींवर अवलंबून राहील, असे या अहवालातून स्पष्ट होते. संबंधित वृत्त जून ते सप्टेंबरदरम्यान केवळ 92% पाऊस:ऊन जास्त तापणार, पाऊस कमी पडणार
ठाणे महानगरपालिकेच्या 'एमआयएम' पक्षाच्या माजी नगरसेविका सहर शेख यांच्या कथित बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून 'नॉट रिचेबल' असलेले सहर शेख यांचे वडील युनूस शेख शुक्रवारी अचानक मुंब्रा पोलिस ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, दोन दिवसांत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, विरोधकांना करारा जवाब मिळेल, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सहर शेख यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून महापालिका निवडणूक लढवल्याची तक्रार सिद्दिकी अहमद यांनी दाखल केली आहे. तक्रारदाराच्या दाव्यानुसार, युनूस शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी असून ते महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आहेत. स्थलांतरित नागरिकांसाठी 'नमुना १०' लागू असताना, युनूस शेख यांनी 'नमुना ८' चा वापर करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. याच कागदपत्रांच्या आधारे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवून सहर शेख यांनी ठाणे महापालिकेत विजय मिळवल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. मुलगी मोठी होतेय म्हणून अनेकांना जळण मुंब्रा पोलिस ठाण्यात सुमारे २० मिनिटे पोलिसांशी चर्चा केल्यानंतर बाहेर पडलेले युनूस शेख पत्रकारांशी बोलताना प्रचंड संतापलेले दिसले. त्यांनी या प्रकरणाला निव्वळ 'राजकीय स्टंट' संबोधले आहे. दोन दिवसांत आम्ही आमची भूमिका कायदेशीररीत्या स्पष्ट करू. जे काही आरोप होत आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहेत. माझी मुलगी राजकारणात मोठी होतेय, हे पाहून अनेकांना जळण होत आहे, त्यातूनच हा त्रास दिला जात आहे, असे शेख यांनी यावेळी स्पष्ट केले. नॉट रिचेबल सहर शेख 'वानखेडे'वर! हे प्रकरण समोर आल्यापासून सहर शेख या नॉट रिचेबल आहेत. मात्र, गुरुवारी त्या चक्क मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचा आनंद घेताना दिसल्या. १६ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्याचा एक व्हिडिओ त्यांनी स्वतः आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून, जर त्या 'नॉट रिचेबल' होत्या, तर मग स्टेडियमवर कशा दिसल्या? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर त्यांचे वडील युनूस शेख यांनी आपली भूमिका मांडली. तिने मॅच पाहायला जाण्यात काय चुकीचे आहे? ती काय पळून गेलेली नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या मुलीची पाठराखण केली. सहर शेख यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीची चर्चा दरम्यान, सहर शेख यांनी आयपीएल सामना पाहयला गेल्यानंतर स्टेडियमच्या गॅलरीतील व्हिडीओ पोस्ट केला आहे. या स्टोरीमध्ये त्यांनी सामन्याच्या व्हिडिओसह गेम ओव्हर असे देखील लिहिले. तसेच तूने ना जाना तेरे जाने से क्या क्या हुआ, कितनी कहानी बनी कितना तमाशा हुआ..जाने तू कैसी होगी..असे गाणेही स्टोरीला लावलेले आहे. स्टोरीला दिलेले कॅप्शन आणि लावलेले गाणे यावरून सहर शेख यांनी सगळ्या विरोधकांना पुन्हा डिवचल्याचे बोलले जात आहे.
आखाडा बाळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत शुक्रवारी तारीख 17 लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. या शिबिरामुळे मंडळ स्तरावर विविध प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यामुळे लाभार्थ्यांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. महसूल विभागाच्या वतीने आखाडा बाळापूर येथे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते तहसीलदार जीवक कुमार कांबळे, नायब तहसीलदार बालाप्रसाद धूत, ग्रामपंचायतच्या प्रशासक भिमाबाई नरवाडे यांची उपस्थिती होती यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी मार्गदर्शन केले. गाव पातळीवर लाभार्थ्यांची कामे गतिमान व्हावी तसेच प्रशासन लोकाभिमुख व कार्यक्षम व्हावे या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय मागील काही दिवसांपासून रखडलेले प्रलंबित फेरफार निकाली काढले जात आहे. सातबारा मधील दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा, उत्पन्न, रहिवासी, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र दिले जात आहे. या अभियानामुळे नागरिकांची मोठी सोय होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर केले जात असून सातबाराची कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील इतर महसूल मंडळामध्ये देखील अशा प्रकारचे शिबिर आगामी काळात घेतले जाणार असून या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केलेया शिबिरामध्ये लाभार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय काही शेतकऱ्यांचे सातबाराचे प्रलंबित फेरफार निकाली काढण्यात आले असून सातबारा दुरुस्ती करून लाभार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या अभियानामुळे लाभार्थ्यांची मोठी सोय झाली असून लाभार्थ्यांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके व त्यांच्या पत्नी अनुराधा यांचा आज समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात मृत्यू झाला. या घटनेविषयी वेगवेगळ्या शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच आता एका प्रत्यक्षदर्शीने शेळके यांच्या पत्नी अपघातानंतर जवळपास अर्धा तास मदतीसाठी ओरडत असल्याची माहिती दिली आहे. या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी व हा अपघात जिथे घडला त्या धोत्रे गावचे सरपंच प्रदीप चव्हाण यांनी सांगितले की, हा अपघात दुपारी 12.30 च्या सुमारास घडला. समृद्धी महामार्गावरील किलोमीटर 506.6 जवळ ही घटना घडली. त्यात एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर मी व काही ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहोचलो. कारमध्ये एक महिला, एक पुरुष व एक 10-12 वर्षांचा मुलगा होता. मुलाला तातडीने कारबाहेर काढून त्याला रुग्णवाहिकेने रुग्णालयात रवाना करण्यात आले. त्याने आपले नाव सांगत आपण जितेंद्र शेळके यांचा मुलगा असल्याचे सांगितले. कदाचित कारमधील महिला वाचली असती प्रदीप चव्हाण यांनी यावेळी सदर अपघातानंतर मदत मिळण्यास बराच विलंब झाल्याचेही यावेळी सांगितले. ते म्हणाले, अपघात साडेबाराला झाला. पण क्रेन 2.15 ला पोहोचले. म्हणजेच तब्बल पावे 2 तास उशीर झाला. क्रेन व मदत अर्ध्या-पाऊण तासात मिळाली असती, तर कदाचित कारमध्ये अडकलेल्या महिलेला वाचवता आले असते. मृत महिला अनुराधा शेळके या कारमध्ये समोरच्या सिटवर बसल्या होत्या. त्यांचा केवळ पाय आम्हाला दिसत होता. त्यावेळी त्या बचावासाठी ओरडत होत्या. आम्हाला त्यांना बाहेर काढता आले नाही. पण त्यांच्या मुलाला मोठ्या प्रयत्नांनतर बाहेर काढता आले. त्याचा हात तुटला होता. कोण होते डॉक्टर जितेंद्र शेळके? डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके हे शिर्डी परिसरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. ते केवळ उद्योजकच नव्हते, तर सिल्व्हर ओक डेव्हलपर्स नावाने त्यांनी रिअल इस्टेटचा एक मोठा व्यवसाय उभारला होता. त्यांची स्वतःची एक शैक्षणिक संस्थाही होती. त्या माध्यमातून त्यांनी शिर्डी व परिसरात आपले एक जाळे विणले होते. त्यांचे व भोंदू अशोक खरात याचे जुने संबंध होते. 2023 मध्ये ते खरातच्या शिवनिक ट्रस्टचे सदस्य बनले. त्यानंतर 2025 मध्ये त्यांची ट्रस्टच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. खरातच्या शिर्डीतील भूखंड व्यवहारात शेळके महत्त्वाचे साक्षीदार होते. त्यांची शिर्डी पोलिसांनी चौकशीही केली होती. भोंदू अशोक खरातची जितेंद्र शेळकेंच्या लॉन्समध्येही भागिदारी होती. त्यामुळे खरातला अटक झाल्यापासून ते कमालीच्या तणावात होते. खरातचे काळे कारनामे बाहेर आल्यानंतर शेळके व सुभाष गमे यांनी ट्रस्टवरील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हे राजीनामे त्यांनी थेट नाशिकच्या धर्मादाय आयुक्तांकडे पाठवले होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आवश्यक युरिया खताचा साठा उपलब्ध करण्याबाबतचे नियोजन करण्याबरोबरच प्रमाणापेक्षा जास्त खताची खरेदी तसेच बेकायदेशीर विक्री होत असलेल्या दुकानदार आणि ग्राहक यांची तपासणी करावी, दोषी आढळणाऱ्या साठेबाज यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय खतसाठा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनय गौडा जी .सी. यांनी बैठकीत दिले.जिल्हास्तरीय खतसाठा सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील. उपविभागीय कृषी अधिकारी श्री आघाव, विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाचे रवींद्र पाटील, जिल्हा विपणन अधिकारी श्री राठोड. जिल्हा कृषि निविष्ठा महासंघाचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांच्यासह आरसीएफ, कोरोमंडल, नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड या खत कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२५-२६ मधील खताची मागणी, आवंठण, विक्री याबाबतचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. यामध्ये युरिया ,डी.ए पी,एम.ओ पी, संयुक्त खते, एस.एस.पी अशा विविध प्रकारच्या खतांची उपलब्धता मागणी आणि कृषी आयुक्तांकडून मंजूर आवंठण याबाबतचा आढावा त्यांनी घेतला .जिल्ह्याला आवश्यक असणाऱ्या खत, युरिया खतसाठा बाबत प्रमाणापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी खतसाठा केला असेल किंवा त्याची विक्री दुकानदाराने केले असेल तर याची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा खतसाठा नियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्ह्यातील युरियाचा बफर्स साठा दहा हजार ५५० मेट्रिक टन असून डीएपी खताचा साठा १२०० मेट्रिक टन संरक्षित करण्यात आलेला आहे. शेतकरी धारण करत असलेल्या शेतीक्षेत्राच्या आवश्यकते पेक्षा जास्त अधिक खतसाठा खरेदी होत असेल किंवा एकाच व्यक्तीच्या नावावर अधिक प्रमाणात खतविक्री होत असेल अशा दुकानदार ,विक्रेते यांची तपासणी करण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करावा.तपासणी अंति दोषी आढळणाऱ्या साठेबाज व्यक्ती आणि दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी दिले. तपासणी करत असताना कृषी विभागाने पोलीस प्रशासनाचे सहकार्य घ्यावे.दोषी आढळणाऱ्या दुकानदारांचा परवाना रद्द करण्याबरोबरच खतांच्या विक्रीवर प्रतिबंध करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या यादीनुसार त्यांनी खरेदी केलेले खताची खातरजमा टास्कफोर्स मार्फत करण्यात यावी .तालुका निहाय विविध खतांची उपलब्धता आणि वितरण यांचे नियोजन याबाबत जिल्हाधिकारी गौडा यांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील कृषी उत्पादन आणि विकासाचा घेतला आढावा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असणाऱ्या प्रमुख पीकपद्धती, फळपीक भाजीपाला, निर्यात होणारे उत्पादने याबरोबरच जिल्ह्यात न लागवडीखालील क्षेत्र व त्या अनुषंगाने कृषी विभागाने केलेल्या नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी घेतला. कापूस, मोसंबी, ऊस, सोयाबीन, या पिकाच्या उत्पादनासंदर्भातील क्षेत्रनिहाय माहिती घेतली तसेच जिल्ह्यामध्ये आवश्यक असणारा खतं आणि बी बियाणे यांच्या मागणीनुसार पुरवठा साठी केलेल्या नियोजनाबाबत आढावा घेतला. यामध्ये एकूण इ पॉस मशीन, खत पुरवठा त्याचप्रमाणे कृषी निविष्ठा विक्री केंद्र तपासणी ,गुणवत्ता नियंत्रण अभियानाअंतर्गत केलेला तपासण्या,कृषी विभागाअंतर्गत असलेल्या विविध कार्यालयाची कार्यपद्धती, खरीप हंगामाचे पूर्व नियोजन याबाबतच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी आढावा सादर केला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडीचा परिणाम थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि राज्यातील राजकारणावर होऊ शकतो. पुढील तीन दिवसांत एक मोठा नेता शरद पवार यांची साथ सोडू शकतो, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे. त्यामुळे या संभाव्य निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणूक आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनामुळे लागली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने त्यांच्या सुपुत्र अक्षय कार्डिले यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे हे उमेदवार म्हणून चर्चेत होते. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी गोविंद मोकाटे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी न भरण्यामागे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी तनपुरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तनपुरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या भेटीमुळेच त्यांनी पाऊल मागे घेतले का, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, प्राजक्त तनपुरे 20 एप्रिल रोजी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ते अंतिम निर्णय जाहीर करतील. काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्यामुळे हा मेळावा घेतला जाणार असल्याचे तनपुरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, ते भाजपमध्ये प्रवेश करणार का किंवा अक्षय कार्डिले यांना थेट पाठिंबा देणार का, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. प्राजक्त तनपुरे यांचा राहुरी तालुक्यात मोठा प्रभाव आहे. नगरपालिका, बाजार समिती आणि साखर कारखाना यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवर त्यांचे वर्चस्व असल्याचे मानले जाते. तनपुरे कुटुंबाला स्थानिक पातळीवर मोठा मान-सन्मान आहे. त्यामुळे त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला, तर भाजपची ताकद या भागात लक्षणीय वाढू शकते, अशी चर्चा आहे. राजकारणाचे चित्र बदलण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही तनपुरे यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. याआधी त्यांनी तनपुरेंची खिल्ली उडवली होती, मात्र आता त्यांची स्तुती करताना दिसत आहेत. एकूणच, पुढील काही दिवसांत प्राजक्त तनपुरे कोणता निर्णय घेतात, यावर राहुरी पोटनिवडणुकीचे आणि राज्याच्या राजकारणाचे चित्र मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात घडलेल्या तरुणींच्या शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली असताना, या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने पोलिस चौकशीत केलेले खुलासे अधिकच धक्कादायक ठरत आहेत. चौकशीदरम्यान अयानने पहिल्या ब्रेकअपनंतर मी प्लेबॉय बनलो, असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकार मानसिक आजारामुळे नव्हे, तर चुकीच्या जीवनशैलीतून आणि विकृत विचारसरणीतून घडलेला आहे. तपासात असे समोर आले आहे की, अयान अहमद सोशल मीडियावर विशेषतः इन्स्टाग्रामवर अत्यंत सक्रिय होता. त्याचे 18 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते आणि तो स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणून सादर करत होता. पेड प्रमोशनच्या माध्यमातून तो पैसे कमवत होता. याशिवाय मोबाईल विक्रीचा व्यवसायही तो करत होता. मात्र, महागडी जीवनशैली आणि मुलींवर खर्च करण्याची सवय यामुळे तो सतत पैसे उधार घेत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. अयानने आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलचा वापर करून तरुणींना आकर्षित करण्याचा मार्ग अवलंबला होता. तो सुरुवातीला मुलींशी मैत्री करत असे आणि चार ते पाच महिने सातत्याने संवाद साधत त्यांचा विश्वास जिंकत असे. विश्वास निर्माण झाल्यानंतर तो त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करत असे किंवा त्यांना दबाव टाकून संबंध ठेवण्यास भाग पाडत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अनेक तरुणी अशा प्रकारे त्याच्या जाळ्यात अडकल्या असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अयान अहमद हा एमआयएम पक्षाच्या अमरावती युनिटचे सोशल मीडिया हँडल देखील सांभाळत होता. मात्र, त्याचे नाव या गंभीर गुन्ह्यात समोर आल्यानंतर संबंधित पक्षाने तातडीने त्याला पदावरून हटवले असल्याचेही समजते आहे. या कारवाईमुळे या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली आहे. पोलिसांकडून सध्या अयानच्या मोबाईलमधील डेटा, चॅट्स आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे. या माध्यमातून आणखी पीडित तरुणींची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. अयानच्या हायफाय जीवनशैलीमागील आर्थिक स्रोतांचाही तपास सुरू आहे. पीडितांना पुढे येण्याचे आवाहन दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील पीडितांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्य मांडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. एकूणच, सोशल मीडियाच्या आडून चालणाऱ्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे समाजासमोर गंभीर प्रश्न उभे राहत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस यंत्रणा प्रयत्नशील आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली असून उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघात हा गंभीर ठरू शकतो, मात्र योग्य खबरदारी घेतल्यास त्यापासून बचाव करणे शक्य आहे, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली असून जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वातानुकूलित कक्ष व आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. आरोग्य विभागामार्फत नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. उष्माघाताची लक्षणे म्हणून तीव्र डोकेदुखी, स्नायू आखडणे, चक्कर येणे, उलटी, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिडेपणा, लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा त्वचा कोरडी पडणे आदी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. घ्यावयाची काळजी काय टाळावे उष्माघात झाल्यास उपाय एखाद्या व्यक्तीस चक्कर, मळमळ, ताप किंवा शुद्ध हरपल्यासारखे वाटल्यास त्याला सावलीत बसवावे, ओल्या कापडाने शरीर थंड करावे आणि त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करावे. लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला, बाहेर काम करणारे कामगार तसेच हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी स्वतःची व कुटुंबियांची योग्य काळजी घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
जागतिक वारसा दिनानिमित्त विदर्भातून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा परिसरात, वर्धा नदीच्या काठी सुमारे २०,००० वर्षांपूर्वीच्या प्राण्यांची दुर्मिळ जीवाश्मे आढळून आली आहेत. यासोबतच पाषाणयुगीन मानवाच्या अवजारांचाही शोध लागला आहे, ज्यामुळे त्या काळातील मानव आणि वन्यजीव यांच्यातील संबंधांवर प्रकाश पडतो. प्रा. सुरेश चोपणे यांनी गेल्या वर्षभरात हे संशोधन केले असून, महाराष्ट्रात प्लेइस्टोसीन काळातील प्राण्यांचे असे जीवाश्म प्रथमच सापडल्याचा त्यांचा दावा आहे. धानोरा-भोयेगाव पुलाजवळील नदीकाठावर बायसन (गवा), रानडुक्कर (ज्याचे दात सापडले), हरणाची हाडे आणि मानवी हाडांचे काही अवशेष आढळले आहेत. यासोबतच पाषाणयुगीन अवजारेही मिळाली आहेत. ही सर्व जीवाश्मे सध्या सुरेश चोपणे रॉक म्युझियममध्ये जतन करून ठेवण्यात आली आहेत. प्रा. चोपणे यांच्या मते, ही जीवाश्मे शेवटच्या हिमयुगातील आहेत. त्या काळात मोठ्या प्रमाणावर बर्फ वितळल्याने महापूर आले असावेत. या महापुरांमुळे प्राणी नदीत वाहून गेले आणि गाळात गाडले जाऊन हजारो वर्षांनंतर त्यांचे जीवाश्मात रूपांतर झाले. प्राण्यांच्या जीवाश्मांसोबत पाषाणयुगीन अवजारे आढळल्याने, त्या काळातील मानव या प्राण्यांची शिकार करत होते, हे स्पष्ट होते. यामुळे विदर्भातील प्राचीन मानवी जीवनाचा एक नवा अध्याय उघडला आहे. चंद्रपूर जिल्ह्याला भूशास्त्रीयदृष्ट्या समृद्ध मानले जाते. येथे विविध कालखंडातील जीवाश्म आढळतात, ज्यात १५० कोटी वर्षांचे स्ट्रोमॅटोलाइट, २० कोटी वर्षांचे वृक्ष जीवाश्म, ६ कोटी वर्षांचे डायनासोर अवशेष आणि २०,००० वर्षांपूर्वीचे हत्ती व इतर प्राण्यांचे जीवाश्म यांचा समावेश आहे. या विविधतेमुळे चंद्रपूरला नैसर्गिक भूशास्त्रीय संग्रहालय म्हणून ओळख मिळाली आहे. पूर्व विदर्भात बेसाल्ट खडकांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने, या भागात पृथ्वीच्या वेगवेगळ्या कालखंडातील जीवसृष्टीचे अवशेष मोठ्या प्रमाणावर जतन झाले आहेत. यामुळेच विदर्भाला भौगोलिक संग्रहालय असे म्हटले जाते. येथे सुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वीचे ग्रॅनाईट आणि रूपांतरित खडक आढळतात, जेव्हा पृथ्वीवर जीवन अस्तित्वात नव्हते. सूक्ष्म जीवांच्या रूपात जीवनाची सुरुवात झाली, त्याचे पुरावे स्ट्रोमॅटोलाइट स्वरूपात दिसतात. त्यानंतर दाट जंगलसृष्टी निर्माण झाली, ज्याचे १० कोटी वर्षांपूर्वीचे वृक्षांचे जीवाश्म आजही सापडतात. सुमारे ६ कोटी वर्षांपूर्वी डेक्कन ट्रॅप ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे लाव्हाचा प्रचंड प्रवाह पसरला आणि त्या आपत्तीत डायनासोरसह अनेक प्रजाती नष्ट झाल्या.
भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांच्या अपघाती मृत्यूवरून राज्याच्या राजकारणात वादळ उठले आहे. अनेक नेत्यांनी हा अपघात नसून, घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच भोंदू अशोक खरातच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अत्यंत धक्कादायक आहे. यापूर्वी अनेकांनी अशोक खरातच्या एन्काउंटरची भीती व्यक्त केली आहे. आजच्या अपघाताच्या निमित्ताने ही भीती अधिक ठळक पद्धतीने अधोरेखित होत आहे, असे ते म्हणालेत. जितेंद्र शेळके आज दुपारी 1 च्या सुमारास आपल्या कुटुंबासह छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात होते. रस्त्यात समृद्धी महामार्गावरील धोत्रे गावालगत त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके व त्यांची पत्नी अनुराधा हे दोघे जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही धडक एवढी भीषण होती की, त्यांची कार थेट कंटेनरखाली घुसली. त्यामुळे तिचा अक्षरशः चुराडा झाला. जखमी मुलाला लगतच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. शेळकेंच्या अपघाती मृत्यूची बातमी अत्यंत धक्कादायक - सुषमा अंधारे सुषमा अंधारे म्हणाल्या, अशोक खरात प्रकरणातील एक महत्त्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे. मला ही गोष्ट खरे तर अविश्वसनीय वाटते. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही भीती किंवा शक्यता व्यक्त केली होती की, अशोक खरातचे एन्काउंटर होऊ शकते. त्याच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. आजच्या घटनेमुळे ही शक्यता अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित होत आहे. कदाचित खरात प्रकरणातील काही सत्यच बाहेर येऊ नयेत असे काही लोकांना वाटत आहे का? असे असले तरीही एसआयटी अजूनही तपासाची गती वाढवत नसेल, या लोकांच्या चौकशा होत नसतील, तर अजून जास्त संशयाचे धूके वाढत आहे. जितेंद्र शेळके हा गुन्हेगारच होता की नव्हता हे कायद्याने ठरवले असते. शिक्षा कायदा देईल. कुणाचा जीव घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. पण जी घटना आज घडली ती मात्र एकूण तपास यंत्रणा आणि एकूण शासन व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे हे मात्र नक्की, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. हा अपघात असूच शकत नाही? - अंजली दमानिया दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही जितेंद्र शेळके यांच्या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. जितेंद्र शेळके हे शिवनिका संस्थानावर नंबर 2 पोज़िशन वर होते. कल्पना खरात आणि रुपाली चाकणकर ह्याच्यापेक्षा त्यांचे वजन जास्त होते. 3 दिवसापूर्वी त्यांची ED चौकशी झाली आणि आज ते गेले ? हा अपघात असूच शकत नाही, असे दमानिया यांनी म्हटले आहे. भोंदू खरातच्या सुरक्षेची काळजी घ्या - रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही हा अपघात अत्यंत धक्कादायक असल्याचा आरोप केला आहे. शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोदू अशोक खरात याचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढं न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढं येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसंच भोंदू खरातच्या चौकशीतही अनेक बाबी पुढं येणार असल्याने त्याच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी, असे ते म्हणाले. नेमका शेळकेचाच अपघात कसा? - अमोल मिटकरी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. जितेंद्र शेळके हा भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय होता. दोन दिवसांपूर्वी त्याची ED चौकशी झाल्याचे समजले. आता काही तासांपूर्वी समृद्धी महामार्गावर त्याचा दुर्दैवी अपघाती मृत्य झाला व कुटुंबीय गंभीर जखमी झाले ही घटना दुर्दैवी असून नेमका याच व्यक्तीचा अपघात कसा झाला हे मात्र न सुटणारं कोडं आहे. या प्रकरणी काहीही सत्य समोर येणार नाही, असे ते म्हणालेत.
भोंदू खरात प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार ठार
मुंबई : भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा आज अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कारने समृद्धी महामार्गावर उभ्या असणा-या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. यासंबंधीच्या माहितीनुसार, जितेंद्र शेळके आज दुपारी १ च्या सुमारास आपल्या कुटुंबासह छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात होते. […] The post भोंदू खरात प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर तिखट हल्ला चढवला आहे. केंद्राने लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना, महिला आरक्षण विधेयकाच्या माध्यमातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा राहील याची तरतूद करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण आज मोदी, शहा असल्यामुळे आपले सुखनैव सुरू आहे, असे गुजरातला वाटत असेल, तर त्यांनी लक्षात ठेवावे, आज तुम्ही सुपात आहात, पण म्हणून कायम सुपात असाल असे नाही. तुम्ही कधी ना कधी जात्यात याल हे विसरु नका, असे त्यांनी म्हटले आहे. खाली वाचा राज ठाकरेंची पोस्ट जशास तशी राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, सध्या केंद्र सरकारने लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation), महिला आरक्षण विधेयक याच्या मार्फत स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा राहील याची तरतूद करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, असं दिसतंय. १३१ व्या घटना दुरुस्तीतून लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना आणि त्यातून महिलांना ३३% आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे असं दाखवलं गेलं. आणि मग अचानक या विधेयकावर चर्चा सुरु असताना अचानक केंद्र सरकारने काल रात्री अधिसूचना काढून घोषित केलं की २०२३ चं महिला आरक्षण विधेयक आजपासून लागू झालं आहे. जर यातील बदलांवर चर्चा सुरु आहे तर मग ही घाई कसली ? केंद्र सरकारला नक्की काय साध्य करायचं आहे ? महिला आरक्षणाला आमचा अजिबात विरोध नाही, उलट महिलांना आरक्षण मिळतंय ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे आज या दुरुस्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह इतर राजकीय पक्ष जो विरोध करत आहेत तो काही महिला आरक्षणाला विरोध नाही हे समजून घ्यावं. मुळात महाराष्ट्राला महिला आरक्षण इत्यादी बाहेरच्यांनी शिकवू पण नये कारण याच राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थात महिला आरक्षण आणलं. ते पुढे म्हणाले, आमचा विरोध हा लोकसंख्येनुसार लोकसभा मतदारसंघांच्या होणाऱ्या पुनर्रचनेला आहे. घटनेतील कलम ८१ आणि ८२ सांगतात की लोकसभेतील जागा राज्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाटल्या जातील. याचा सरळ अर्थ ज्या राज्यांनी शिक्षण, आरोग्य, महिलांचं सक्षमीकरण करून लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांच्या मेहनतीला शिक्षा आणि ज्यांनी वाट्टेल तशी लोकसंख्या वाढू दिली आणि संपूर्ण राज्यच्या राज्य बर्बाद केली त्या राज्यांचा संसदेतील टक्का वाढणार हा कुठला अजब न्याय? म्हणजे पश्चिम बंगाल असेल, पंजाब असेल, ओडिशा असेल किंवा ईशान्य भारतातील राज्य असतील किंवा महाराष्ट्र गोवा आणि दक्षिणेतील इतर राज्य असतील या राज्यांमध्ये जिथे स्वतःची एक संस्कृती आहे , स्वतःची भाषा आहे,स्वतःची एक लिपी आहे आणि इथे अशा राज्यांचे हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सुरु करणार हे नक्की. राज ठाकरे म्हणाले, मुळात उत्तरेच्या ३, ४ राज्यातील लोकांनी गुजरात, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ या राज्यात मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात तर या लोकांच्या मतपेढ्या, मतदारसंघ बनले आहेत. या प्रांतातून आलेले लोकं इथे लोकप्रतिनिधी होत आहेत. बरं ते इथे निवडून आलेत म्हणून त्यांची या प्रांताबद्दल काही आस्था आहे असं नाही, त्यांचं लक्ष आपापल्या राज्यांकडे आहे. आज जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे तीच गुजरातसकट दक्षिणेच्या इतर राज्यांमध्ये पण होणार हे नक्की. म्हणजे या राज्यांमध्ये हेच निवडून येणार आणि तिकडे पण हेच निवडून येणार... त्यात पुन्हा डिलिमिटेशन आयोग हा स्वायत्त असेल आणि ते मतदारसंघांची पुनर्रचना निष्पक्षपणे करतील अशी अपेक्षा बाळगणं पण चुकीचं आहे. मतदारसंघ फोडणे या विषयांत एकूणच महापालिका निवडणुकांमध्ये जे कौशल्य दाखवलं गेलं तसंच कौशल्य डिलिमिटेशन का दाखवणार नाही? तसंही आज देशात कुठल्याही आयोगाकडे निष्पक्षता आहे का? असो. राज ठाकरे पुढे म्हणाले, मुळात हा देश हे एक संघराज्य आहे याचं भान कुठे गेलं आहे ? गुजरात, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ या राज्यांचा प्रजनन दर हा त्यांनी २ च्या खाली आणण्यात यश मिळवलं आहे आणि उत्तरेच्या राज्यांचा प्रजनन दर हा ३ च्या आसपास आहे. म्हणजे ज्यांनी समजूतदारपणा दाखवला त्यांना शिक्षा ? आणि गेल्या ७ दशकांत कोणतंही भान आलं नाही त्यांचा आवाज संसदेत मोठा असणार हा कुठला न्याय ? बरं हे मोठ्या संख्येने संसदेत गेल्यावर काय करतील याचा अंदाज घ्यायचा असेल तर २०१० साली संसदेत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाने त्यावेळच्या महिला विधेयकाचा प्रस्ताव फाडला होता हे लक्षात घ्यावं लागेल. सध्याच अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्राने जर केंद्राला कररूपात १ रुपया दिला तर राज्याला कसेबसे ३० ते ४० पैसे परत येतात पण त्या उलट उत्तर प्रदेशाने १ रुपया कररूपात दिला तर त्यांना उलट ३ रुपये आणि बिहारला चक्क ५ रुपये मिळतात. म्हणजे कराचा हिस्सा पण मिळणार नाही आणि आता तर महाराष्ट्र, गोवा सकट दक्षिणेतील पाचही राज्यांचा संसदेतील आवाज पण कमी होणार. हे खपवून घेतलं जाणार नाही. राज ठाकरे म्हणाले, आत्ताच हिंदी सक्तीच्या नावाखाली सरकारने काय काय प्रकार केले हे सगळ्यांनीच पाहिले. उद्या वाढलेल्या खासदारांच्या जोरावर या संपूर्ण देशाचं हिंदीकरण करतील. ही भीती सार्थ आहे. आणि म्हणूनच दक्षिणेतील राज्य याविरोधात एकवटली आहेत. या सगळ्यात गुजरात राज्यातील लोकप्रतिनिधींची काय भूमिका आहे हे माहित नाही. सध्या श्री. नरेंद्र मोदी आणि श्री. अमित शाह आहेत म्हणून आपलं सुखनैव सुरु आहे असं जर गुजरातला वाटत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावं, आज तुम्ही सुपात आहात पण म्हणून कायम सुपात असाल असं नाही, तुम्हीही कधी ना कधी जात्यात याल हे विसरु नका. ते पुढे म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा गेली १० वर्ष पक्ष फोडत होता, आमदार, खासदार फोडत होता, राजकीय घरांमध्ये फूट पाडत होता, जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली माथी भडकवत होता, पण आता यांची मजल देशात दोन गट पाडण्यापर्यंत गेली आहे. डिलिमिटेशनच्या नावाखाली स्वतःची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष जो प्रयत्न करत आहे, त्यांनी हा देश कायमचा दुभंगेल आणि राज्याराज्यांत स्वायत्ततेची मागणी सुरु होईल. येव्हढच नव्हे तर याचे परिणाम आपल्या संरक्षण आणि गृह विभागात देखील दिसून येतील ! अवघ्या काही दशकांपूर्वी पंजाबमध्ये खलिस्तानच्या मागणीने काय रक्तरंजित संघर्ष उभा केला होता हे विसरू नका... जो असंतोष पंजाबमध्ये निर्माण झाला होता तसा असंतोष उद्या ईशान्य भारतातील राज्यांपासून ते दक्षिणेतील राज्यांमध्ये निर्माण झाला तर? आणि अशी परिस्थिती उद्भवली तर त्याला भारतीय जनता पक्षाची सत्तेची राक्षसी महत्वकांक्षा जबाबदार असेल हे नक्की. ज्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या नावाने राजकारण करता आणि मतं मागता, त्या वल्लभभाईंना हा देश एकत्र आणताना काय संघर्ष करावा लागला होता हा इतिहास भाजपच्या लक्षात असेल असं मी गृहीत धरतो. त्या संघर्षाला तुमच्या स्वार्थासाठी मातीमोल करू नका. राज ठाकरे म्हणाले, लोकसभेच्या जागा वाढवायच्या असतील तर त्या वाढवा जरूर पण सध्याचा राज्यांचा जो कोटा आहे त्याला कुठेही धक्का नाही लागला पाहिजे. गुजरात , पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळा, आसाम तसेच पूर्वेकडील राज्यांच्यासाठी किमान हमी जागा द्या आणि उरलेल्या लोकसंख्येनुसार जागांचे वाटप करा. सध्या केंद्र सरकार जे करत आहे तो एक प्रकारे आगीशी खेळ खेळत आहेत. लोकसभा हा आकड्यांचा आखाडा बनवून त्यांना सत्तेत रहायचं आहे पण त्यांना हे समजत नाहीये की आज ना उद्या याने भारताच्या संघरचनेच्या पायालाच धक्का लागेल आणि त्यातून या देशात अराजकता माजायला वेळ सुद्धा लागणार नाही ! मी वर्तमानपत्रात वाचलं की चंद्राबाबू नायडूंनी केंद्राच्या या प्रयत्नांना पाठींबा घोषित केला आहे. माझी त्यांना पण विनंती आहे की सत्तेचा भाग आहे म्हणून तुमची फरफट होऊ देऊ नका. आज तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री. रेवंत रेड्डी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री. स्टॅलिन हे ठामपणे लढा देत आहेत, तशी अपेक्षा या देशातील सर्व स्वाभिमानी आणि ज्या राज्यांकडे स्वतःची सांस्कृतिक अस्मिता आहे अशा प्रत्येक राज्यातील राजकीय पक्षांकडून आहे. लक्षात ठेवा देशाची राजकीय संस्कृतीच बदलून टाकण्याचा प्रयत्न होत आहे, आणि एकदा का ती बदलली की तुमच्या पायाखालची जमीन सरकली म्हणून समजा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महिला आरक्षणाला पाठींबा आहे पण त्याची ढाल करून जे काही उत्तरेच महत्व वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे त्याला स्पष्ट विरोध आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याविरोधात वेळेस तीव्र आंदोलन उभं करेल हे नक्की, असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
भाजपच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला विरोध
मुंबई : लोकसभेत सुरू असलेल्या नारी शक्ती वंदन म्हणजेच महिला आरक्षण संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयकांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. महाविकास आघाडीने या विधेयकातील महिला आरक्षणास आपला पाठिंबा असल्याचे म्हटले. मात्र, महिला आरक्षणाच्या आडून लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा डाव असल्याची टीका विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील या विधेयकातील महिला […] The post भाजपच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला विरोध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिक : नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचा-यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्यावर आता कंपनीने मोठी कारवाई केली आहे. कंपनीने निदा खानला तात्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित केले असून तसे अधिकृत पत्र जारी केले आहे. संबंधित कंपनीचे हे पत्र ९ एप्रिल […] The post निदा खानची हकालपट्टी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बस स्थानकातील स्वच्छतागृहे १ जूनपासून मोफत
पुणे/ कोल्हापूर : राज्यातील लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या १ जूनपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत केली जाणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज कोल्हापूर दौ-यावर असताना ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज कोल्हापूर दौ-यावर होते. यावेळी त्यांनी कोणतीही […] The post बस स्थानकातील स्वच्छतागृहे १ जूनपासून मोफत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
८ हजार कोटींची बिले मार्गी लागणार
पुणे : राज्यातील कंत्राटदारांची बांधकाम विभागाकडे १८ हजार कोटींची बिले अदा करणे बाकी आहे. ती बिले येत्या दोन ते चार महिन्यांत अदा होतील, असे बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच यापुढे आता रस्ते बांधणी करताना थीम समोर ठेवूनच रस्ते बांधणी केली जाईल, मागेल तेथे रस्ते होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच […] The post ८ हजार कोटींची बिले मार्गी लागणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने पोलिसांनी तातडीने मोठ्या बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या डॉक्टरांकडून त्याची सखोल वैद्यकीय तपासणी सुरू असून पुढील उपचारांबाबत निर्णय तपासणीनंतरच घेतला जाणार आहे. या घटनेमुळे प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रुग्णालयात नेताना वाल्मिक कराडचा बदललेला चेहराही समोर आला. दीर्घ काळ तुरुंगात राहिल्यामुळे त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. केस पांढरे पडलेले, शरीर अशक्त झाल्याचे आणि थकवा जाणवत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या अवस्थेमुळे कराडच्या आरोग्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, रुग्णालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल होताच त्याच्या समर्थकांनीही रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली. डॉक्टरांकडून आवश्यक चाचण्या सुरू असून त्याच्या प्रकृतीची स्थिती नेमकी काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, त्याच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचा जामीन अर्ज यापूर्वी अनेक वेळा न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि अगदी सर्वोच्च न्यायालयानेही त्याला दिलासा नाकारला आहे. त्यामुळे त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढतच गेला आहे. या प्रकरणात सध्या न्यायालयीन सुनावणी सुरू असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. कृष्णा आंधळे अद्यापही फरार या हत्याप्रकरणाला जवळपास दीड वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडसह एकूण पाच आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र, कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तो बीडमध्ये येऊन गेल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला होता, ज्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. एकूणच, हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडल्याने या प्रकरणाकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. त्याच्या जामिनासाठी सुरू असलेली धडपड आणि न्यायालयाकडून मिळणारा नकार, तसेच आता उद्भवलेली आरोग्याची समस्या, या सर्व घडामोडींमुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणात काय वळण येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जी. श्रीकांत यांनी आज छत्रपती संभाजीनगर विभागाचे नूतन विभागीय आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी मावळते विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून सूत्रे घेतली. पापळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, अपर आयुक्त प्रताप काळे, अपर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, अपर आयुक्त दादासाहेब वानखेडे, अपर आयुक्त सुषमा देसाई, अपर आयुक्त मंजुषा मिसकर, सहआयुक्त राजेश काटकर, सहायक आयुक्त मंजुषा कापसे, सहआयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त सविता हरकर, महानगर नियोजनकार हर्षल बाविसकर, उपमहानगर नियोजनकार रवींद्र जायभाये, सहायक आयुक्त शुभांगी आंधळे, उप मुख्य लेखाधिकारी साधना बांगर यांच्यासह अनेक प्रादेशिक विभागप्रमुख उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर विभागीय आयुक्त श्री. श्रीकांत यांनी विभागप्रमुखांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील शेती, टंचाईस्थिती, सामाजिक आणि प्रशासकीय विषयांबाबत माहिती जाणून घेतली. सर्वांनी समन्वयाने काम करून विभागाचा विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. छत्रपती संभाजीनगर विभाग सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असल्याचे श्री. श्रीकांत यांनी नमूद केले. पर्यटन विकासाला चालना देण्यासोबतच शिक्षण, आरोग्य, महत्त्वपूर्ण उपक्रम आणि रोजगाराभिमुखतेवर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. विभागाला सर्वांगीण विकासाच्या दिशेने नेऊन राज्यात अग्रस्थानी आणण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. प्रशासकीय कामकाजात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासोबतच तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्यावर भर दिला जाईल. ई-ऑफिस प्रणालीचा 100 टक्के अवलंब करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशासकीय कामकाजात अंतर्गत समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. श्री. श्रीकांत हे 2009 च्या यूपीएससी बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी परभणी येथे परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केला, त्यानंतर किनवट येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली. नांदेड-वाघाळा महानगरपालिका आयुक्त, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला व लातूर जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी सहआयुक्त तसेच महानगरपालिका आयुक्त या पदांवर त्यांनी यापूर्वी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यात 1 मे पासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा बंधनकारक करण्यास विरोध दर्शवला आहे. सरकारने या प्रकरणी कायद्याचे शिस्त लावावी. पण कुणाचे घर उद्ध्वस्त करू नये. परिवहन विभागाच्या नव्या नियमामुळे कष्टकरी बांधवांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच 1 मे पासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का? याची पडताळणीही या प्रकरणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपरोक्त भूमिका स्पष्ट केली आहे. भाषेचा आग्रह सक्तीचा नव्हे तर प्रेमाचा असावा रामदास आठवले म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरातील शेकडो रिक्षा-टॅक्सी चालक मला प्रत्यक्ष भेटून आणि फोनवरून संपर्क करत आहेत. परिवहन विभागाने जो नवा नियम जाहीर केला आहे, त्याबाबत या कष्टकरी बांधवांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे. आमचा परवाना रद्द झाला तर आमची मुले काय खाणार? हा त्यांचा केविलवाणा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे मराठीचा अभिमान आम्हाला आहे आणि तो असायलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला इथली संस्कृती आणि भाषा अवगत असावी, ही एक चांगली गोष्ट आहे. मराठी शिकल्यामुळे चालकांचा प्रवाशांशी संवाद सुलभ होईल आणि व्यवसायातही मदत होईल. पण भाषेचा आग्रह धरताना तो केवळ सक्तीचा न राहता प्रेमाचा असावा, असे ते म्हणाले. कायद्याने शिस्त लावा, पण घर उद्ध्वस्त करू नका रामदास आठवले पुढे म्हणाले, रिक्षा चालवणारा माणूस हा काही श्रीमंत घरचा नसतो. केवळ शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे किंवा गरिबीमुळे अनेक तरुण या व्यवसायाकडे वळतात. अनेकांनी कर्ज काढून, स्वतःचे घर गहाण ठेवून रिक्षा घेतल्या आहेत. अशा वेळी जर त्यांचा परवाना रद्द केला, तर केवळ एक चालक नव्हे, तर त्याच्यावर अवलंबून असलेले संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येईल. कायद्याने शिस्त लावावी, पण कोणाचे घर उद्ध्वस्त करू नये. आपल्या मुंबईची हीच तर खासियत आहे की इथल्या विविधतेत एकता आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर हॉटेल व्यवसायातील 'शेट्टी' समाज किंवा इतर अनेक समाजातील लोक व्यवसायासाठी बाहेरून आले. सुरुवातीला त्यांना मराठी येत नव्हती, पण काळानुसार त्यांनी ती आत्मसात केली. आजही अनेक जण उत्तम मराठी बोलून आपला व्यवसाय वाढवत आहेत. त्यांना कोणी सक्ती केली नाही, तर ते इथल्या मातीशी समरस झाले. मग हाच न्याय रिक्षाचालकांना का नाही? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला. आरपीआय संबंधितांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आपल्या देशाचे संविधान प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा आणि पोटापाण्यासाठी व्यवसाय करण्याचा अधिकार देते. भाषेच्या मुद्द्यावरून कोणाचे उपजीविकेचे साधन हिरावून घेणे हे संविधानिक तत्त्वांच्या विरोधात ठरू शकते. कायद्याची भीती दाखवून बदल घडवण्यापेक्षा, विश्वासात घेऊन बदल घडवणे जास्त प्रभावी ठरते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) ही नेहमीच गोरगरिबांची आणि शोषितांची ढाल राहिली आहे. कोणताही निर्णय घेताना कोण्या गरीबाच्या पोटावर पाय पडणार नाही आणि कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी आरपीआय खंबीरपणे उभी राहील. शेवटी, माझ्या सर्व रिक्षाचालक बांधवांना एकच सांगणे आहे तुम्ही मराठी शिकण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्की करा. भाषा ही जोडण्यासाठी असते, तोडण्यासाठी नाही. सरकारनेही दंडात्मक कारवाईपेक्षा प्रशिक्षणावर भर द्यावा, जेणेकरून मराठीचा सन्मानही राहील आणि कष्टकऱ्यांचा स्वाभिमानही, असेही रामदास आठवले यांनी या प्रकरणी ठणकावून सांगितले आहे.
नाशिक आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी टीसीएसमध्ये उघडकीस आलेल्या 'कॉर्पोरेट जिहाद' प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या तौसीफ खानचा एक जुना व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये तो एका हिंदू तरुणाचे धर्मांतर करत असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण केशरी रंगाचा कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. या तरुणाला तौसीफ खान मुस्लिम धर्माचे आचरण करण्यास भाग पाडत असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येते. हा व्हिडिओ तौसीफच्या धर्मांतराचा पुरावा मानला जात आहे. काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये? गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने पसरत आहे. यामध्ये एक तरुण केशरी रंगाचा कुर्ता परिधान केलेला दिसत असून, तौसीफ खान त्याला मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजांचे पालन करण्यास सांगताना दिसत आहे. हा व्हिडिओ तौसीफने जाणीवपूर्वक चित्रीत केला असून, तो संबंधित तरुणाचे धर्मांतर करत असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओमुळे पोलिस तपासाला आता एक ठोस दिशा मिळाली आहे. रोजा, नमाज आणि बीफची सक्ती या प्रकरणात समोर आलेल्या पीडित तरुणाने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटलंय की, तौसीफने त्याला बळजबरीने रोजा धरायला लावला आणि कामाच्या ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी दबाव टाकला. धर्मांतर करण्यासाठी त्याला बळजबरीने बीफ खायला घातल्याचा गंभीर आरोपही या तरुणाने केला आहे. हिंदू धर्माबद्दल चुकीची माहिती देऊन आणि मुस्लिम धर्माचे श्रेष्ठत्व पटवून देऊन त्याचे ब्रेनवॉशिंग करण्याचा प्रयत्न तौसीफ आणि फरार आरोपी निदा खान यांनी केल्याचे समोर आले आहे. एनआयएकडून चौकशी सुरू टीसीएस कंपनीतील धर्मांतर, तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे पोलिसांनी एनआयएकडे (राष्ट्रीय तपास संस्था) दिली. आरोपींना पैशांचा पुरवठा आणि परदेशातून होत असलेली मदत या विषयीची ही कागदपत्रे आहेत. त्यावरून चौकशी सुरू झाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे पथकही शुक्रवारी नाशिकमध्ये येत आहे. दरम्यान, मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी रझा रफिक मेमन, शफी शेखला 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. महिला आयोगाच्या समितीत निवृत्त न्यायाधीशांसह 4 सदस्य राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणी ‘सुओ मोटो’ दखल घेतली आहे. अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश साधना जाधव, हरियाणाचे माजी पोलिस महासंचालक बी. के. सिन्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या वकील ॲड. मोनिका अरोरा आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या वरिष्ठ समन्वयक लीलाबती यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. ती आज (दि. 17) नाशिकमध्ये टीसीएस कंपनीसह संबंधित ठिकाणी चौकशी करेल. अधिकाऱ्यांशी चर्चाही करेल. त्याचा अहवाल रहाटकर यांना सादर केला जाईल.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ससून रुग्णालयाच्या 'सायलेन्स झोन'मध्ये डीजेचा वापर करून ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात बंडगार्डन पोलिस अपयशी ठरले आहेत. पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही, ८० तासांनंतरही कोणतीही कारवाई झालेली नाही. या दुर्लक्षाविरोधात सामाजिक कार्यकर्ते राहुल डंबाळे मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. राहुल डंबाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालय परिसरात झालेल्या नियमांच्या उल्लंघनाबाबत त्यांनी पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांची भेट घेतली होती. यावेळी शिविणकर यांनी बंडगार्डन पोलिस निरीक्षकांना यापूर्वीच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असूनही स्थानिक पोलिस प्रशासनाने या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप डंबाळे यांनी केला आहे. १२ एप्रिलपासून या आवाजाच्या मर्यादेबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. ८० तासांहून अधिक काळ उलटूनही बंडगार्डन पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत. डंबाळे यांनी म्हटले आहे की, एकीकडे भीमसेवा प्रतिष्ठानने शांततेत अभिवादन करण्याचा आदर्श जपला, तर दुसरीकडे पोलिस प्रशासन कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. बंडगार्डन पोलिसांच्या या निष्क्रियतेची आणि वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याची गंभीर दखल घेत, राहुल डंबाळे यांनी आता न्यायालयीन लढाईचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली जाणार आहे. यामध्ये दोषी मंडळांसोबतच, ८० तास उलटूनही गुन्हा दाखल न करणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (PCCOER) च्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातर्फे 'डिजिटल वेलनेस' या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मानसशास्त्रीय समुपदेशक प्रा. शिल्पा संधाने यांनी डिजिटल वापराच्या समस्यांवर जागरूकता आणि उपायांवर मार्गदर्शन केले. तंत्रज्ञान युगात डिजिटल वेलनेसची मूलभूत संकल्पना आणि त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रा. संधाने म्हणाल्या. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकळत परिणाम होत आहेत. अनेकजण डिजिटल वस्तूंच्या वापराचे व्यसनी झाले आहेत, ज्यामुळे डिजिटल वापराच्या समस्यांवर जागरूकता विकसित होणे गरजेचे आहे. प्रा. संधाने यांनी सांगितले की, जास्त स्क्रीन टाइम, सोशल मीडियावर अवलंबित्व, एकाग्रतेत घट आणि झोपेचे विकार यांसारख्या समस्या उद्भवत आहेत. यामुळे सुसंवाद कमी होऊन नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो, तसेच सहनशीलता आणि संवेदनशीलता कमी होऊन कुटुंबात भांडणे वाढत आहेत. यावर उपाय म्हणून, स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवणे, डिजिटल डिटॉक्सचा अवलंब करणे, वेळेचे योग्य नियोजन करून ऑफलाइन उपक्रमांना प्राधान्य देणे आणि सोशल मीडियाचा मर्यादित व सजग वापर करणे आवश्यक आहे, असे मानसशास्त्रीय समुपदेशक प्रा. संधाने यांनी मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत ही एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. यावेळी प्रा. वृंदा आंबेकर, पीसीसीओईआरचे संचालक व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, उपसंचालक प्रा. डॉ. राहुल मापारी, अकॅडमिक डीन डॉ. अर्चना चौगुले, कॉम्प्युटर विभाग प्रमुख डॉ. विजय कोतकर, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 9 जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक अशी एकूण 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पार पडणार असून त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 23 एप्रिलला अधिसूचना, 30 एप्रिलपर्यंत अर्ज, 2 मे रोजी छाननी, 4 मेपर्यंत माघार आणि 13 मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या निवडणुकीत राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेतल्यास भाजपला 5, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः उमेदवारी घेणार का, की दुसऱ्या नेत्याला संधी देणार, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही आपली हालचाल सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी अनेक इच्छुकांची नावे पुढे येऊ लागली आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत, हनमंत पवार आणि राजेश राठोड यांची नावे चर्चेत आहेत. या सर्व नेत्यांनी उमेदवारीसाठी स्वारस्य दाखवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील एकमेव जागा काँग्रेसकडे जाईल का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने देखील आपली रणनीती आखत असल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीतील इतर पक्ष त्यांना पाठिंबा देतील, अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून यापूर्वी मांडली गेली आहे. मात्र, जर ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, तर शिवसेनेतून अनेक नेत्यांची नावे पुढे येत आहेत. यामध्ये अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, राजन विचारे, वैभव नाईक आणि सूरज चव्हाण यांचा समावेश आहे. या निवडणुकीत सध्याच्या काही आमदारांचा कार्यकाळ संपत असल्यानेही स्पर्धा अधिक रंगणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे. तसेच प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत नवीन चेहरे संधी मिळवतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर समीकरण एकूणच, विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. काँग्रेसने आपले पर्याय खुले ठेवले असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर या निवडणुकीचे समीकरण मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय हालचाली आणखी वेग घेण्याची चिन्हे दिसत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारने आणलेल्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे संपूर्ण भारताची फसवणूक होणार असल्याचा दावा केला आहे. प्रस्तुत विधेयकामुळे दक्षिण भारतातील राज्यांचे अधिकार संपुष्टात येतील. सोबतच महाराष्ट्राचेही प्रचंड नुकसान होईल, असे ते म्हणालेत. केंद्र सरकारने लोकसभेच्या पटलावर महिला आरक्षण व सीमांकनाशी संबंधित 3 विधेयक मांडलेत. या प्रकरणी सत्ताधारी व विरोधकांत आरोप - प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. सत्ताधारी या विधेयकांचे फायदे पटवून देत आहेत. तर विरोधक हे विधेयक कसे नुकसानकारक आहे? यावर आपली भूमिका मांडत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या सरकारच्या मतदारसंघ पुनर्चना विधेयकामुळे देशाचे संतुलन बिघडून दक्षिण भारतातील राज्यांचे अधिकार संपुष्टात येण्याची व महाराष्ट्राचेही मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे दुबळीकरण आम्हाला मान्य नाहीजितेंद्र आव्हाड म्हणाले, मतदारसंघांचे सीमांकन किंवा मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) ही संपूर्ण भारताची फसवणूक आहे. महिला आरक्षणाचे विधेयक पुढे करून सन 2011 च्या लोकसंख्येवर आधारीत पुनर्रचना किंवा सीमांकन ही सबंध देशाची फसवणूक आहे. सत्ता ताब्यात घेण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करणारा भाजपा आता अशा मार्गाचा अवलंब करीत आहे की, ज्यामुळे संपूर्ण देशाचे संतुलन बिघडून जाईल. दक्षिणेच्या राज्यांचे अधिकारच निघून जातील. तर, महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान होईल! मराठी माणसांनो, जागे व्हा; नाहीतर आधीच क्षीण झालेला महाराष्ट्राचा दिल्लीतील आवाज नाहिसा झालेला असेल. महिलांना पुढे करून लढाई लढणे, हे शोभणारे नाही. समतेसाठी महात्मा फुले उभे राहिले होते. आरक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले होते. त्यामुळे आरक्षण देणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. देशात पहिल्यांदा महिलांना आरक्षण हे आदरणीय शरद पवार साहेब यांनीच दिले होते. त्यामुळे महिला अन् महिलांचे आरक्षण, त्यांचे सक्षमीकरण याबाबत महाराष्ट्राला शिकवण्याची गरज नाही. हे सक्षमीकरण करीत असताना प्रतिनिधीत्वात महाराष्ट्राचे दुबळीकरण किंवा अशक्तीकरण करणे, आम्हाला मान्य होणार नाही. 850 खासदारांना चर्चेसाठी वेळ मिळेल का? जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड येथील लोकसंख्येच्या बळावर भारतीय संघराज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला तर त्यातून संपूर्ण महाराष्ट्रासह दक्षिण- ईशान्य भारत, बंगाल, ओडिशा, पंजाब, काश्मीर आदी राज्ये ठराविक विचारधारेच्या वसाहती होतील. दुसरी आणि तेवढीच महत्वाची बाब म्हणजे, लोकसभा मतदार संघांच्या सीमांकनामुळे किंवा पुनर्रचनेमळे लोकसभेची सदस्य संख्या 543 वरून 850 पर्यंत वाढेल. ही संख्या वाढविणे सोपे आहे. पण, 850 खासदारांना चर्चा करण्यासाठी वेळ मिळेल का? साहजिकच वाढलेल्या खासदार संख्येमुळे राज्याच्या विशेषतः महाराष्ट्र आणि दक्षिणेतील लोकसंख्येला न्याय मिळण्याची शक्यता अगदीच धूसर ठरणार आहे. त्यामुळे दिल्लीचे तख्त राखणाऱ्या मराठी माणसाने लढण्यास सज्ज झाले पाहिजे, असेही आव्हाड या प्रकरणी म्हणालेत.
एका मुलाने आमच्या मुलींवर अत्याचार करत त्याचे 150 हून अधिक व्हिडिओ काढले आहेत. हे व्हिडिओ सर्व सोशल मिडीयावर व्हायरल केले. त्यामध्ये एकही व्हिडिओ बुरख्यावाल्याचा नाही त्या आमच्या मुली आहेत, असे माजी खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. एकही मुलगी त्यांची नाही सर्व आमच्या मुली आहेत. प्यारे खान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांसाठी आज बिल आणत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिला सशक्त व्हाव्या म्हणून काम करत आहेत. दुसरीकडे तुम्ही महिलांना उद्ध्वस्त करत आहात. पीडितेची माहिती सार्वजनिक केल्याबद्दल त्यांच्यावर पोक्सोनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. राणा देशाला उद्ध्वस्त करू इच्छिता यावर बोलताना राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान म्हणाले की, नवनीत राणा या महाराष्ट्राला आणि देशाला उद्ध्वस्त करू इच्छित आहेत. हिंदू मुलांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असून यातून हिंदूंना संकटामध्ये टाकत आहेत. त्यांनी विचार केला पाहिजे. या प्रकरणात कोणत्याही हिंदू मुलींचा समावेश नाही हे मला नागपूरमध्ये समजते पण त्यांना अमरावतीमध्ये बसून समजत नाही. तुम्ही कसे म्हणू शकता की 180 च्या 180 मुली या हिंदू होत्या. त्यामध्ये एकाही मुस्लीम मुलीवर अत्याचार झाला नाही. असे बोलणं महिला नेत्या म्हणून तुम्हाला शोभत नाही. राणांवर कारवाई व्हावी प्यारे खान म्हणाले की, नवनीत राणा यांनी पीडित अल्पवयीन मुलींची माहिती सार्वजनिक केली आहे. कायद्यानुसार पीडितांची ओळख उघड करणे हा गंभीर गुन्हा असून, त्याअंतर्गत राणा यांच्यावर कारवाई व्हावी. या प्रकरणात 180 हिंदू मुलींचे शोषण झाल्याच्या अफवा पसरवून दंगा भडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा प्यारे खान यांनी केला आहे. प्रत्यक्षात या सर्व 8 पीडित मुली मुस्लीम समाजाच्या असून त्यातील चार परतवाडा, तीन अमरावती आणि एक नागपूर येथील आहे. पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी प्यारे खान म्हणाले की, अमरावती अत्याचार प्रकरणी अफवा पसरवणारी व्यक्ती कोणत्याही पक्षामध्ये काम करत असो किंवा कितीही मोठी असो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे आम्ही पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणातील एक आरोपी होता तो आरोपीला रुम मिळवून देत होता. 2 मुलींवर अत्याचार झाला तर 6 मुलांसोबत केवळ फोटो आहेत.
धर्मांध शक्ती सत्तेत असल्यामु्ळे महाराष्ट्रात अघोरी विद्या, कर्मकांड व बुवाबाजीचे स्तोम माजल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या प्रकरणी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या दिवंगत नरेंद्र दाभोलकर यांची आठवण काढली आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतरही महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी होत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे ते म्हणालेत. भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला असताना चंद्रपूर जिल्ह्यातही अघोरी पूजेचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी मागील दोन वर्षांपासून गुप्तधनाच्या आमिषाने कुमारिका व विधवा महिलांचा अघोरी पूजेसाठी वापर केला जात आहे. त्यात त्यांचे मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण झाल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. धर्मांध शक्तींमुळे बुवाबाजीला खतपाणी विजय वडेट्टीवार म्हणाले, धर्मांध शक्ती सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात अघोरी विद्या, कर्मकांड, बुवाबाजी या प्रकारांना खतपाणी मिळाले आहे. चंद्रपुरातही पैशाचा पाऊस पाडण्याच्या, गुप्ताधनाच्या आमिषाने गेल्या 2 वर्षांपासून अघोरी खेळ सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी कासव, घुबड अशा दुर्मिळ वन्यजीवांसह अल्पवयीन मुली, विधवा महिलांचा पूजेसाठी वापर करण्यात आला आहे. या प्रकरणात महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचीही शक्यता आहे. स्व. नरेन्द्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अक्षरशः स्वतःचे प्राण त्यागले. त्यांच्या या बलिदानानंतरही महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी होत नाही ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मी हा मुद्दा उपस्थित केला होता. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची नियमावली बनवावी अशीही मी मागणी केली होती. अजून किती बळी गेल्यानंतर, किती महिलांचे शोषण झाल्यानंतर नियमावली होणार आहे? अशा प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणालेत. आत्ता पाहू नेमके काय आहे चंद्रपूरचे प्रकरण? चंद्रपूरच्या सावली वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी गत 12 तारखेला 3 दुचाकींवरून 2 जिवंत कासवांची तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक केली. या आरोपींच्या मोबाइलमध्ये वन्यजीव तस्करीसोबतच अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ व चॅटिंग आढळले. स्मशानभूमीत मध्यरात्री केलेल्या अघोरी पूजेचे व्हिडिओ, घुबड व कासवांचे फोटो, तसेच अनेक तरुणी मुली व विधवा महिलांचे फोटो, त्यांच्या जन्मकुंडल्या आणि एवढेच नव्हे तर त्यांच्या खासगी अवयवांचे फोटोही पोलिसांना आढळले. आरोपींनी काही महिलांच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंदही ठेवली होती. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. आरोपींनी अघोरी पूजेतून सोन्याची बिस्किटे मिळाल्याचा बनाव रचला होता. पण ती बिस्किटे बनावट असल्याचे उघड झाले. या प्रकरणी 6 आरोपींना सध्या वनकोठडीत डांबण्यात आले आहे. पण या प्रकरणाचा मुख्य सत्रधार असलेला मांत्रिक व महाराज अद्याप फरार आहेत. हे प्रकरण लवकरच पोलिस विभागाकडे वर्ग केले जाणार आहे.
कैलास टेकडीवर जाणाऱ्या भाविकांचा ऑटो उलटून ८ जखमी
श्रीक्षेत्र माहूर : श्री दत्त शिखर संस्थान समोरील पहाडावर अतिउंच टेकड्यावर असलेल्या श्री कैलास टेकडी येथे दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या आटोला श्रीदत्त शिखर श्री दत्त शिखर ते दत्त मांजरी घाटातील तिसऱ्या घातक वळणावर ऑटो चालकाचा ताबा सुटल्याने ऑटो उलटून चालकासह ८ भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १७ रोजी सकाळी ८.३० वाजता घडली आहे. हिंगोली […] The post कैलास टेकडीवर जाणाऱ्या भाविकांचा ऑटो उलटून ८ जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
येत्या 12 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांवर कुणाला संधी द्यावी? या मुद्यावर सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीत जोरदार माथापच्ची सुरू आहे. त्यातच आता शिवसेना गटाकडून या जागेसाठी दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांच्यासह 6 जणांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यात ठाकरे गटाची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे ठाकरे गट अंधारेंना विधान परिषदेवर संधी देणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. यापैकी 9 जागा या नियमित असून, 1 जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक संपल्यानंतर लगेचच मतमोजणी होऊन रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर होईल. विधानसभेतील संख्याबळानुसार, सत्ताधारी भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 5 जागा येणार आहेत. तर त्यांचे मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेनेला 2, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 1 जागा येणार आहे. यात विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघी 1 जागा येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेवर जाणार की? आपल्या इतर एखाद्या नेत्याला संधी देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेतील या आमदारांचा संपणार कार्यकाळ सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. पण स्वतः उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाण्यास उत्सुक आहे. त्यांची आपल्या एखाद्या सहकाऱ्याला विधान परिषदेवर पाठवण्याची इच्छा आहे. यात विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रवक्त्या सुषमा अंधारे, माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजन विचारे, माजी आमदार वैभव नाईक, सचिव सूरज चव्हाण आदींची नावे चर्चेत आहेत. पण यातही दानवे व अंधारे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने ज्योति वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवले आहे. वाघमारे ह्या एक दलित नेत्या आहेत. यामुळे शिवसेनेची सर्वसामान्यांतील प्रतिमा काहीशी उंचावली आहे. त्यामुळे ठाकरे गटही सुषमा अंधारेंना विधान परिषदेवर संधी देईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेषतः सुषमा अंधारे यांची पक्षावरील टीका परतावून लावण्याची क्षमता पाहताही ठाकरे त्यांच्या बाजूने आपला कौल देतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधान परिषदेतील या आमदारांचा संपणार कार्यकाळ विधान परिषदेची पोटनिवडणूक
हडपसरमधील हांडेवाडी परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या पुणे महापालिकेच्या सहायक निरीक्षकाला भाजी विक्रेत्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेत निरीक्षकाच्या गाडीची काचही फोडण्यात आली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (16 एप्रिल) सायंकाळी सातच्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हांडेवाडीतील भाजी विक्रेत्यांविरुद्ध कारवाई सुरू होती. त्यावेळी भाजी विक्रेत्या महिलांनी कारवाईला विरोध करत सहायक निरीक्षक अमोल लावंड यांना धमकावले. विक्रेत्यांनी लावंड यांच्यावर महिलांना शिवीगाळ केल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यानंतर अतिक्रमण कारवाईस विरोध करत एकाने लावंड यांच्या गाडीची काच फोडली. या घटनेबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील सहायक निरीक्षक अमोल लावंड यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शीतल महेश डांगे, रेखा सुदेश रोकडे, शाहिन मियाँसाहेब शेख, उषा दादाराव गायकवाड आणि सोनू सुदेश रोकडे (सर्व रा. हांडेवाडी) यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख करत आहेत. किरकोळ वादातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्याचा खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना वारजे-एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. क्रिश सुरेंद्रसिंग (वय 20, रा. अचानक चौक, उत्तमनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत विशाल चंद्रकांत घोरपडे (वय 36, रा. लक्ष्मी निवास, देशमुखवाडी, शिवणे) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे यांचा सरबत विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपींनी वैमनस्यातून क्रिश याला शिवीगाळ करुन त्याला मारहाण केली. क्रिश याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
पुणे स्टेशन परिसरात धावत्या पीएमपी बसमध्ये एका प्रवासी तरुणाने वाहक महिलेवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी प्रवासी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुरेखा बळीराम भालेराव (वय 38, रा. मुळशी, मूळ रा. मुखेड, नांदेड) असे जखमी झालेल्या वाहक महिलेचे नाव आहे. त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका भवन ते विमाननगर मार्गावरील पीएमपी बस पुणे स्टेशन परिसरातील अलंकार चित्रपटगृह चौकातून जात असताना ही घटना घडली. भालेराव प्रवाशांचे तिकीट काढत असताना त्यांनी एका प्रवासी तरुणाला तिकीट काढण्यास सांगितले. यावरून तरुणाने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भालेराव यांनी त्याला बसमधून खाली उतरण्यास सांगितल्यावर, संतप्त तरुणाने त्यांच्या मांडीवर चाकूने वार केला. त्यानंतर तो प्रवासी तरुण बसमधून उडी मारून पसार झाला. पसार झालेल्या तरुणाचा शोध सुरू असून, पोलिस उपनिरीक्षक एन. चव्हाण पुढील तपास करत आहेत. अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार दरम्यान, आणखी एका घटनेत, अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आणि ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी एका आरोपीवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल उर्फ सागर वसंत रानडे (वय 24, रा. शेडगे डेअरी, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार जानेवारी 2025 ते 15 मार्च 2026 या कालावधीत घडला. आरोपीने मुलीचा गर्भपात घडवून आणल्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे.
नवी पेठेतील एका खासगी रुग्णालयात 11 महिन्यांच्या बालकाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांसह दोन परिचारिकांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय उपचारात निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी डॉ. मुकुंद संगमनेरकर, डॉ. गणेश आरेकर, डॉ. श्रीधर जाधव, डॉ. राधा संगमनेरकर, तसेच परिचारिका मनीषा शिंदे आणि सारिका सुतार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हनुमंत गणपतराव गिते (वय 34, रा. हेरंब सोसायटी, बालाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, हनुमंत गिते यांची 11 महिन्यांची मुलगी आदिती हिला उलटीचा त्रास होत असल्याने मे 2025 रोजी नवी पेठेतील या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. गिते यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, डॉक्टरांना उपचारात हलगर्जी केल्यास मुलीचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव होती. तरीही डॉक्टर आणि परिचारिकांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडे सोपवण्यात आली होती. समितीने केलेल्या चौकशीत, 11 महिन्यांच्या बालिकेवर चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आल्याचे आणि वैद्यकीय निष्काळजीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीच्या निष्कर्षांनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम 2023 अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक काळे पुढील तपास करत आहेत. ॲसीड फेकत चेहरा विद्रुप करण्याची धमकी एकावर गुन्हा दाखल तरूणीला चेहऱ्यावर ॲसीड फेकुन विद्रुप करण्याची धमकी देऊन तिच्याशी अश्लिल चाळे करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजय तळेगाव (रा. संभाजीनगर, कदमवाक वस्ती, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 25 वर्षीय तरूणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे
पुणे, नाशिक आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अमली पदार्थांची वाढती विक्री हा गंभीर प्रश्न बनत चालला असून यावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सची विक्री होत असताना हे नेमकं कुठून येतं, याचा सरकारला पत्ता नाही का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. या मुद्द्यावर त्यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अमित ठाकरे यांनी सांगितले की, अमली पदार्थांचा व्यापार दिवसेंदिवस वाढत असून त्याची भीषणता आता उघडपणे दिसू लागली आहे. ज्या प्रमाणात ड्रग्स विकले आणि खरेदी केले जात आहेत, ते खरोखरच धक्कादायक आहे, असं ते म्हणाले. या वाढत्या प्रवृत्तीमुळे समाजावर, विशेषतः तरुण पिढीवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. याहूनही गंभीर बाब म्हणजे शाळांच्या परिसरातही अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शाळांच्या जवळच बेधडकपणे ड्रग्स विकले जातात, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार असलेल्या यंत्रणांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारला या सर्व गोष्टींची माहिती नाही का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर टीका केली. इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला हा बेकायदेशीर व्यवसाय थांबवण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. अमली पदार्थांचा वाढता वापर आणि त्याचा तरुणांवर होणारा परिणाम हा चिंतेचा विषय असल्याचे सांगत अमित ठाकरे यांनी या विरोधात व्यापक मोहीम राबवण्याची गरज व्यक्त केली. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर होण्यापूर्वी सरकारने यावर ठोस पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे हे पुणे जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, पक्षाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. अमित ठाकरे यांच्यासोबतच अविनाश अभ्यंकर यांची नियुक्ती झाल्यानंतर हा पहिलाच संयुक्त आढावा दौरा ठरणार आहे. 17 ते 19 एप्रिल 2026 या कालावधीत पुणे शहरात अमित ठाकरे विविध बैठका, चर्चा आणि भेटीगाठी घेणार आहेत. त्यानंतर 25 एप्रिल रोजी ते पुणे ग्रामीण भागाचा दौरा करणार असून, शहरासह ग्रामीण संघटन रचनेचा सखोल आढावा घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पक्षाची सध्याची स्थिती, कार्यकर्त्यांची ताकद आणि भविष्यातील दिशा यावर विशेष भर दिला जाणार आहे. कार्यकर्ते आणि नव्या चेहऱ्यांशी थेट संवाद या दौऱ्यात अमित ठाकरे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नव्या चेहऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. संघटन मजबूत करण्यासाठी कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रित करायचे, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच नवीन कार्यकर्त्यांना संधी देत पक्षाचा विस्तार कसा वाढवता येईल, यावरही चर्चा होणार आहे. मनसेच्या दृष्टीने हा दौरा केवळ औपचारिक नसून, संघटनात्मक बदलांची सुरुवात मानली जात आहे. पुण्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ठोस रणनीती आखण्याचा प्रयत्न या दौऱ्यात केला जाणार आहे. शहरात आणि ग्रामीण भागात कार्यकर्त्यांना एकत्र आणून पक्ष अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न दिसून येणार आहे. नवनियुक्तीनंतरचा हा पहिलाच दौरा असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस दावा करणार आहे, संजय राऊत यांनी काही दावा करू नये. राज्यसभेला राष्ट्रवादी काँग्रेसला संधी देण्यात आली. आता विधान परिषदेला संधी मिळावी म्हणून हर्षवर्धन सपकाळ हे प्रयत्न करत आहेत, म्हणून उद्धव ठाकरे यांना संधी मिळते का हे सुद्धा बघावे लागले, कारण तुमच्या सर्वांचा मिळून केवळ एकच उमेदवार निवडून येऊ शकतो, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेमध्ये काय केले हे महाराष्ट्राने पाहिले आहे. कधीतरी अमावस्या-पौर्णिमेला विधान परिषदेमध्ये यायचं आणि जनतेचा एकही प्रश्न मांडायचा नाही, अशी उद्धव ठाकरे यांची कारकीर्द होती. त्यांना मविआ पुन्हा एकदा संधी देते का? हे देखील बघावे लागेल. उद्धव ठाकरेंना आता जर विधान परिषदेची जागा मिळाली तर संजय राऊत यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार म्हणून त्यांना ही जागा उद्धव ठाकरेंना मिळू नये, ते पुन्हा विधान परिषदेवर जाऊ नये असे राऊतांना वाटते. राऊतांचा महिला आरक्षणाला विरोध नवनाथ बन म्हणाले की, महिला आरक्षण विधेयक संसदेत पास होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये महिलांना आरक्षण देण्याचे काम होत आहे. जे यापूर्वी काँग्रेसला जमले नाही. आज संजय राऊत पुन्हा एकदा तोंडावर पडणार आहेत. कारण महिला आरक्षणाचे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर होणार आहे. त्यानंतर तुम्हाला तोंड दाखवण्यासाठी जागा मिळणार नाही. तुम्ही महिलांच्या आरक्षणाला विरोध करत आहात. तुम्हाला लाडक्या बहिणी माफ करणार नाही नवनाथ बन म्हणाले की, लाडक्या बहिणींच्या विरोधात मविआत आणि संजय राऊत कायम भूमिका घेत असतात. लाडक्या बहिणींचे पैसे बंद करा असे आज संजय राऊत यांनी म्हटले आहे. लाडक्या बहिणींना सन्मान निधी मिळतो त्यामुळे महिला सन्मानाने जगत आहे. त्यांचे पैसे बंद करा म्हणायला राऊतांना लाज वाटली पाहिजे. तुम्हाला लाडक्या बहिणी माफ करणार नाही. यापूर्वी विधानसभेला आणि मनपाला लाडक्या बहिणींनी तुम्हाला बाजूला केले आहे. राऊतांनी भाजपवर बोलूच नये नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत भाजपबद्दल तुम्ही काही बोलूच नये, जनतेने तुम्हाला विधानसभेला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला आहे. रोज सकाळी 9 वाजता कोण भुंकते आणि ती जबाबदारी कोणाला दिली हे जनता बघते आहे.सकाळी उठायचे आणि भुंकात संस्कृती डुबवण्याचे काम राऊत यांनी केले आहे.
सदाभाऊ खोत पुरोगामी विचार तुम्हाला झेपण्यापलिकडचे आहेत, त्यामुळे फार बाता मारू नका, असे म्हणत पवार कुटुंब हे कधीच पुरोगामी नव्हते, या आमदार सदाभाऊ खोत यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या की, सदाभाऊ, तुम्ही ज्या पवार कुटुंबावर टीका करत आहात, त्याच कुटुंबाचा भाग आदरणीय अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी सुद्धा आहेत. विशेष म्हणजे, तुम्ही आणि तुमचे सवंगडी सध्या ज्यांचा प्रचार करत आहात, त्या सुनेत्रा वहिनी त्याच घराण्यातील आहेत. माणसाने बोलताना आपल्याला झेपेल तितकंच बोलावं. पवार कुटुंबांचे मोठे योगदान रोहिणी खडसे म्हणाल्या की, शरद पवारांचे वडील सत्यशोधक चळवळीत सक्रिय होते. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्यात मोलाची साथ दिली. पवारांच्या मातोश्री ब्रिटिश राजवटीत पुणे लोकल बोर्डाच्या सदस्या होत्या.जिथे समाज वंशाच्या दिव्यासाठी मुलाचा अट्टाहास धरतो, तिथे पवार साहेबांनी मुलीच्या जन्माचे स्वागत करून कृतीतून पुरोगामी विचार जपले आहेत. पवारांच्या निर्णयामुळे महिलांना मिळाले बळ रोहिणी खडसे म्हणाल्या की, महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी 1994 मध्ये मुख्यमंत्री असताना स्थानिक स्वराज्य संस्थांत 33% आरक्षण देऊन देशात महिला आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली होती, याचा मला सार्थ अभिमान आहे.महिलांना केवळ राजकारणातच नव्हे, तर निर्णय प्रक्रियेत स्थान मिळावे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून शरद पवारांनी महाराष्ट्रात क्रांतिकारी पाऊल उचलले होते. त्यांच्या या निर्णयामुळेच आज हजारो महिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नेतृत्वाची संधी गाजवत आहेत. काय म्हणाले होते सदाभाऊ खोत? बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारादरम्यान बोलताना सदाभाऊ खोत यांनी पवार कुटुंबावर सत्तागामी असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की, पवार कुटुंब कधीच पुरोगामी नव्हते. पुरोगामीत्वाच्या आडोशाने केवळ सत्ता मिळवणे हाच त्यांचा महाराष्ट्रातील एककलमी कार्यक्रम राहिला आहे. राज्यात शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेऊन मतांचा पुरोगामी जोगवा मागायचा आणि सत्तेच्या खुर्चीवर बसायचे, हेच त्यांचे राजकारण आहे. यावेळी त्यांनी पुरोगामी विचारवंतांच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारला देशात बहुसंख्यांकवाद राबवायचा आहे. त्यामुळेच या सरकारने महिला आरक्षण विधेयकाला सीमांकन विषयाला जोडले आहे, असा आरोप विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. विरोधकांनी सरकारची नियत ओळखल्यामुळेच त्यांना या प्रकरणी राजकारण न करण्याचे आवाहन केले जात आहे, असे ते म्हणालेत. केंद्र सरकारने गुरुवारी लोकसभेच्या पटलावर महिला आरक्षण व सीमांकनाशी संबंधित 3 विधेयक मांडले. या विधेयकांवर आज सलग दुसऱ्या दिवशी चर्चा होणार आहे. या प्रकरणी सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत असताना आता सामाजिक वर्तुळातही त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वकील असीम सरोदे यांनी या प्रकरणी मोदी सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी जे भाषणात बोलतात ते प्रत्यक्ष कायद्याच्या प्रस्तावात नसल्याचा दावा करत त्यांनी हा देश केवळ मोदींच्या तोंडी गॅरंटीवर चालणार काय? असा तिखट प्रश्नही उपस्थित केला आहे. मोदी जे बोलले, ते कायद्याच्या प्रस्तावात नाही असीम सरोदे म्हणाले, पंतप्रधान मोदी जे भाषणात बोलतात ते कायद्याच्या प्रस्तावात नाही. मोदींच्या तोंडी गॅरंटी वर देश चालणार का? महिला आरक्षणाला कुणाचाच विरोध नाही. पण त्याला सीमांकन विषयाशी जोडणाऱ्या मोदी-शाह व आरेसेस ला बहुसंख्यांकवाद राबवायचा आहे ही 'नियत' विरोधकांनी ओळखल्याने त्यांना सांगितले जातेय की यात राजकारण करू नका. जाहिरातबाजाने भाषणात असेही सुमार वक्तव्य केले की विधेयकाचे श्रेय तुम्हाला हवे असेल तर घ्या, तुमचे अभिनंदन करणाऱ्या जाहिराती आम्ही छापू. काय टूकारपणा आहे हा? असे ते म्हणाले. ते अन्य एका पोस्टमध्ये म्हणाले, मोदी एक भाषणबाज प्रवृत्ती आहे. परंतु आता अनेक नेते आणि सामान्य लोक सुद्धा अश्या प्रवृत्ती कशा हाताळायच्या हे शिकले आहेत. मोदी बाहेर राजकीय भाषण करतात तसेच संसदेत बोलतात. जेव्हा ते म्हणाले, महिला आरक्षणाला विरोध करू नका वाटल्यास त्याचे क्रेडिट विरोधी पक्षांनी घ्यावे. एक जण लगेच म्हणाले की, Delimitation म्हणजे परिसीमांकन नंतर कधी करा आणि त्याचे क्रेडिट तुम्ही घ्या. प्रत्येक गोष्टीत राजकारण व राजकीय हेतू ठेवणाऱ्या छुपा अजेंडा वाल्यांचे पितळ असे उघडे पडतांना दिसतेय, असे सरोदे म्हणालेत. लोकसभा सदस्यांची संख्या 543 वरून 850 होणार केंद्र सरकारच्या सीमांकनाशी संबंधित विधेयकानुसार, लोकसभेची सदस्यसंख्या सध्याच्या 543 वरून थेट 850 पर्यंत वाढणार आहे. या प्रस्तावामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दक्षिण भारतातील राज्यांनी यावर चिंता व्यक्त केली असून लोकसंख्या नियंत्रणात आघाडीवर असलेल्या राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होऊ नये, अशी मागणी केली आहे. या कायद्यामुळे उत्तर भारतातील राज्यांमधील जागांची संख्या लक्षणीयरीत्या वाढण्याची चिन्हे आहेत.
हिंगोली शहरालगत बळसोंड भागात किरकोळ कारणावरून एकास मारहाण करून 85 हजार रुपयांचा मुद्देमाल पळविल्याच्या आरोपावरून तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 16 सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील मंगळवारा भागातील रहिवासी बालाजी चव्हाण हे शहरालगत बळसोंड येथे प्लॉटवर कामासाठी गेले होते. यावेळी त्या ठिकाणी काम करीत असतांना कृष्णा भोसले, पंकज सोळंके, समीक कांबळे हे तिघेजण त्या ठिकाणी आले. यामध्ये तू एका महिलेस पैसे उधार का दिले या कारणावरून कृष्णा याने बालाजी यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. शाब्दीक चकमकीनंतर वाद वाढत गेला. यामध्ये कृष्णा, पंकज व समीक यांनी बालाजी यांना काठीने मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या मारहाणीमुळे ते प्रतिकार करू शकले नाही. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. यावेळी तिघांनी बालाजी यांच्या हातातील चांदीचे 25 तोळे वजनाचे कडे, हाताच्या दोन बोटातील अंगठ्या व खिशात असलेले रोख 20 हजार रुपये असा एकूण 85 हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला. दरम्यान, या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बालाजी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. या प्रकरणी बालाजी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी कृष्णा भोसले, पंकज सोळंके, समीक कांबळे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, जमादार बाळासाहेब खोडवे पुढील तपास करीत आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया देत जोरदार पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यामागे भाजपला कोणतेही कारण नव्हते, असे स्पष्ट करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी भाजपच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. राऊत म्हणाले की, भाजपचे लोक सध्या तमाशा बघत असतील, पण एक दिवस हेच प्रकरण त्यांच्या अंगावरही येईल. राज्यातील भाजपमधील मराठी नेत्यांनी या सगळ्यावर लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच राजकीय हेतूने विरोधकांवर आरोप करण्याची पद्धत चुकीची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नेमके प्रकरण काय? संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना मोठा राजकीय वाद निर्माण झाला. शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली. सावंत यांनी ब्रिजभूषण सिंह आणि कुलदीप सेंगर यांचा उल्लेख करताच दुबे यांनी आदित्य ठाकरेंचे नाव घेत गंभीर आरोप केले. या वक्तव्यामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाला आणि वातावरण तापले. या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपने काही भुंकणारे लोक पाळून ठेवले आदित्य ठाकरेंचं नाव घेण्याचं कोणतंही कारण नव्हतं, असा ठाम आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील नेत्यांची बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक वातावरण तयार केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपने काही भुंकणारे लोक पाळून ठेवले आहेत, अशा तीव्र शब्दांत त्यांनी टीका करत भाजपच्या मराठी नेत्यांनाही सुनावलं. दरम्यान, संसदेमध्ये अशा प्रकारे आरोप-प्रत्यारोप करणं ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब असल्याचं राऊत यांनी नमूद केलं. पार्लमेंटचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी याबाबत कारवाईची मागणी केली. निशिकांत दुबे यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ठाकरे कुटुंबावरील टीकेचा निषेध महाराष्ट्रातील नेत्यांवर बाहेरील नेते वारंवार टीका करत असताना राज्यातील भाजप नेते शांत का आहेत, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. जर इतर कोणावर अशा प्रकारे हल्ला झाला असता तर आम्ही उभे राहिलो असतो, असं सांगत त्यांनी ठाकरे कुटुंबावरील टीकेचा निषेध केला. भाजपने तयार केलेलं वातावरण भविष्यात त्यांच्यावरच उलटेल, असा इशाराही त्यांनी दिला. महिलांच्या खात्यात पैसे टाकून मत मिळवण्याचा प्रयत्न दरम्यान, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असताना ते तात्काळ लागू करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. निवडणुका आल्या की महिलांच्या खात्यात पैसे टाकून मत मिळवण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी सुनावले. धमक्या देण्यापेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणी करा, तेव्हाच महिलांचा खरा पाठिंबा कोणाला आहे हे समजेल, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.महिला आरक्षण विधेयकाच्या चर्चेपासून सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. आगामी काळात या प्रकरणावर आणखी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
अमरावती अत्याचार प्रकरण:अयानसोबत केक कापला; 6 पोलिस कर्मचारी मुख्यालयात जमा, आरोपींची संख्या आठ
मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अयान अहमद तनविर अहमद (वय 19) या मुख्य आरोपीला तीन दिवसांपूर्वी अटक केली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अयान आणि परतवाडा पोलिस ठाण्यातील एक पोलिस अधिकारी-कर्मचारी एकत्रीत येवून केक कापतानाचा एक जुना व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाई करत परतवाडा ठाण्यातील एका सहायक पोलिस निरीक्षकासह सहा पोलिसांना तत्काळ मुख्यालयात संलग्न (अटॅच) केले आहे. हा प्रकार नेमका कधी आणि कुठे घडला, याबाबतही सविस्तर चौकशी आता केली जाणार आहे. दरम्यान अयान मुलींना फिरायला नेण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन जात असे. मुलींसोबत गैरवर्तन करण्यासाठी त्याने आतापर्यंत वझ्झर डॅम, परतवाडा शहरातील तीन आणि अमरावती शहरातील दोन अशा पाच कॅफेंचा वापर केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मानवसुगंधे याचा कठोरा नाका भागात फ्लॅट आहे; या फ्लॅटवर मुलीला घेऊन गेला आणि अत्याचार केला.अयानने एका पीडितेवर अत्याचार केल्याचे व्हिडिओतून समोर आले. या प्रकरणात आजवर एकही पीडिता स्वतःहून समोर आली नाही मात्र, पंधरा दिवसांपूर्वी एक मुलगी पालकांसह तक्रार देण्यासाठी परतवाडा पोलिस ठाण्यात गेली असल्याची माहिती समोर येत आहे. तिची तक्रार नोंदवण्यात आली नाही का? किंवा या प्रकरणात नेमके काय घडले, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी अचलपूरचे एसडीपीओ तथा एसआयटी प्रमुख शुभमकुमार यांना दिले आहेत. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आठही आरोपींच्या घरांची पोलिसांनी घेतली झडती मानव हा त्याला पैशांच्या मोबदल्यात हा फ्लॅट उपलब्ध करून देत होता. ही बाबसमोर आल्यानंतर गुरुवारी ग्रामीण पोलिसांनी या फ्लॅटवर जाऊन पंचनामा केला व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. पोलिसांनी यापूर्वीच अयानकडून एक मोबाईल जप्त केला होता, त्यानंतरआता एक लॅपटॉप आणि टॅबही जप्त करण्यात आला असून त्यातील डेटा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, पोलिसांनी आतापर्यंत सर्व आठही आरोपींच्या घरांची झडती घेऊनत्यांचे मोबाईल जप्त केले आहेत. पुरावे किंवा माहीती असल्यास आम्हाला द्यावी या प्रकरणात अयानकडून एका पिडीतेसोबत लैंगिक अत्याचार झाला असून ते घटनास्थळ शहरातील आहे.त्यामुळे पोलिस आयुक्तांनासुद्धा आम्ही त्याबाबत सविस्तर माहीती दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक झाली असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच राजकिय व्यक्तींकडे या प्रकरणाशी संबधित काही पुरावे किंवा माहिती असल्यास आम्हाला द्यावी, जेणेकरुन तपासात मदत होईल. - विशाल आनंद, पोलिस अधिक्षक. कठोरा नाका भागातील मित्राच्या खोलीचा केला वापर शहरातील कठोरा नाका भागातील एकामित्राच्या खोलीचा वापर केला होता. ही खोली उपलब्ध करून देणाऱ्या त्याच्या मित्रालाही पोलिसांनी गुरूवारी (दि. 16) अटक केली असून, अयान अहमद तनविर अहमद (19, रा. परतवाडा),उजेर खान इक्बाल खान (20), मो. सादमो. साबिर (22), तरबेज खान तसलीम खान (24, तिघेही रा. अचलपूर), मानव दिपक सुगंधे (20, रा. आर्वी, ह. मु.अमरावती), ऐफाज खान मंजुर खान (26), मो. इमरान मो. साजीद (21)आणि शेख नावेद शेख हसन (21,तिघेही रा. अचलपूर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांमधून रकमांचा ठणठणाट असून ग्राहक अन अधिकाऱ्यांमधून पैशासाठी वादावादीला तोंड फुटले आहे. आरबीआय कडूनच रकमांचा कमी पुरवठा झाल्यामुळे नाणे टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मात्र चांगलाच फटका सहन करावा लागते. वसमत येथे अधिकारी व ग्राहकांच्या वादातून दोघांवर गुरुवारी ता. 16 वसमत शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकेच्या सुमारे 60 पेक्षा अधिक शाखा आहेत. या शाखांना भारतीय स्टेट बँकेकडून रकमांचा पुरवठा केला जातो. तर भारतीय स्टेट बँकेला आरबीआय कडून रक्कम पुरविली जाते. मागील काही दिवसांत आरबीआयकडून कमी प्रमाणात रक्कमेचा पुरवठा झाल्यामुळे जिल्ह्यातील बँकांना रक्कम पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचा बँकेच्या व्यवहारावर परिमाण झाला असून बँकेतून पैसे मिळत नसल्याने ग्राहकांच्या एटीएमवर रांगा लागत आहे. तर दुसरीकडे एटीएम मधे देखील ठणठणाट निर्माण झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या हळदीची खरेदी विक्री जोरात सुरु आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांकडे खरेदी केलेल्या हळदीचे पैसे देण्यासाठी रकमा नाहीत. त्यामुळे व्यापारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल नेनवाणी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे निवेदन सादर करून बँकांना आवश्यक सूचना देण्याची मागणी केली आहे. सध्या तरी बँकेतून पैसे मिळत नसल्याने बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले आहेत. सध्या लग्नसराई असल्यामुळे या कार्यक्रमांसाठी बँकेत ठेवलेले पैसे काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र पैसे मिळत नसल्याने या ग्राहकांचीही मोठी अडचण झाली आहे. त्यातून बँकेमध्ये अधिकारी व ग्राहक यांच्यात वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान , वसमत येथील कॅनरा बँकेच्या शाखेत 3.29 लाख रुपये रोख स्वरुपात का देत नाही या कारणावरून बँकेचे अधिकारी श्रध्दा चव्हाण यांना दोघांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार गुरुवारी ता. 16 घडला आहे. या प्रकरणी चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी मिरासे, जमादार गजानन भोपे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, बँकेत होणाऱ्या वादाच्या घटनांना अधिकारी देखील कंटाळले असून प्रत्येक ग्राहकांना समजावून सांगतांना अधिकाऱ्यांच्या तोंडाला फेस येऊ लागला आहे. त्यामुळे आता वरिष्ठस्तरावरून रक्कमांचा पुरवठा कधी होणार याकडे बँकेसह शेतकरी व बँक खातेदारांचे लक्ष लागले आहे.
यात्रेसाठी भाविक नेण्याचा मंत्रालयातून परवाना काढून देण्यासाठी सहा लाख रुपये घेऊन फसवणूक केली तसेच पैसे परत मागितल्यानंतर मारहाण करणाऱ्या पाच जणांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला असून त्यासाठी पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला येथील टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचे सोईल अहमद खान यांच्या मार्फत माजीद पाशा (रा. वसमत) व शेख अतीखुर रहेमान, शेख रिजवान (रा. अर्धापूर) हे भाविकांना यात्रेसाठी पाठवित होते. मात्र सोईल यांच्याकडे भाविक यात्रेसाठी पाठविण्याचा परवाना नसल्याने ते इतरांच्या माध्यमाातून भाविकांना यात्रेसाठी पाठवित होते. मागील दोन ते तीन वर्षापासून त्यांचे व्यवहार सुरु होते. दरम्यान, यात्रेसाठी भाविकांना पाठविण्याचा मंत्रालयातून परवाना काढून देतो असे सांगत वरील तिघांनी सोईल खान यांच्याकडून सन 2024 मध्ये 6 लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी काही कागदपत्रे घेतली. आत मंत्रालयातून परवाना मिळाल्यानंतर आपल्याच टूर्स कंपनीकडून भाविकांना याात्रेसाठी पाठविता येईल अशी सोईल खान यांनी अपेक्षा होती. मात्र सहा लाख रुपये घेतल्यानंतर त्यांनी काहीही केले नाही. याप्रकारामुळे सोईल खान यांनी पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र तिघेही रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागले होते. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पैशाचा तगादा लावण्यास सुरवात केली. मात्र यावेळी शेख माजीद याने आणखी काही भाविकांना यात्रेसाठी पाठवायचे आहे असे सांगत सोईल खान यांना ता. 14 एप्रिल रोजी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना एका वाहनामध्ये बसवून अर्धापूरकडे नेले. त्या ठिकाणी पाच जणांनी मिळून त्यांना मारहाण करून त्यांच्या मोबाईल मध्ये असलेला डाटा डिलीट केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या सोईलखान यांनी सदर प्रकार त्यांच्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी थेट वसमत शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी सोईल खान यांच्या तक्रारीवरून माजीद पाशा, शेख अतीखुर रहेमान, शेख रिजवान व अन्य दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले पुढील तपास करीत आहेत.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता सर्वांचे लक्ष एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे लागले आहे की, उद्धव ठाकरे पुन्हा विधानपरिषदेच्या रिंगणात उतरणार का? त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ 13 मे रोजी संपत असल्याने ते पुन्हा सभागृहात येतील का, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर या चर्चेला अधिकच उधाण आले आहे. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 9 नियमित जागांसह एका पोटनिवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळाचा विचार केला तर भाजपला 5, शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना उमेदवारी दिली जाणार का, यावर संपूर्ण राजकीय समीकरण अवलंबून असल्याचे मानले जाते. पक्षांतर्गत पातळीवरही त्यांनी पुन्हा विधानपरिषदेत यावे, असा दबाव असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी 2020 मध्ये विधान परिषद सदस्यत्व स्वीकारले होते. आता त्यांचा कार्यकाळ संपत असताना ते पुन्हा निवडणूक लढवतील का, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. जर त्यांनी उमेदवारी दिली, तर निवडणूक बिनविरोध करण्याकडे सत्ताधारी भाजपचा कल राहू शकतो, असे संकेत राजकीय सूत्रांकडून मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे भाजपचे 231, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 40 असे एकूण भक्कम संख्याबळ आहे. या आधारावर महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 असल्याने त्यांना एकच जागा निश्चित मिळू शकते, तर दुसऱ्या जागेसाठी अतिरिक्त 10 मतांची गरज भासणार आहे, जी सध्या कठीण वाटते. उद्धव ठाकरेंचा निर्णय गेमचेंजर ठरू शकतो निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार 23 एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर होईल, 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 2 मे रोजी छाननी होणार असून 4 मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 12 मे रोजी मतदान व मतमोजणी होणार असून 13 मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा निर्णय केवळ त्यांच्या राजकीय भवितव्याचाच नाही, तर संपूर्ण निवडणुकीच्या समीकरणाचा गेमचेंजर ठरू शकतो.
व्हिडिओ, शोषण आणि पैज:अमरावतीतील धक्कादायक कट कारस्थान समोर; मुलींच्या शोषणाचा घृणास्पद प्रकार उघड
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात घडलेल्या तरुणींच्या लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. सुरुवातीला सामान्य वाटणाऱ्या या प्रकरणामागे एक भयानक आणि विकृत मानसिकतेचा खेळ लपलेला असल्याचे तपासात उघड झाले आहे. दोन तरुणांमधील एका विचित्र पैजेपासून या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली होती. आपल्यापैकी कोण जास्त मुलींना आकर्षित करू शकतो? या स्पर्धेने पुढे अत्यंत गंभीर गुन्ह्याचे रूप घेतले. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद (वय 19) आणि त्याचा साथीदार उझेरखान इकबाल खान (वय 20) यांनी या पैजेचा विकृत छंद बनवला होता. अयान अहमद हा मुलींना फसवून त्यांच्यासोबत केलेल्या अश्लील कृत्यांचे व्हिडिओ बनवत असे. हे व्हिडिओ तो उझेरखानला पाठवत असे. सुरुवातीला ही एक प्रकारची स्पर्धा म्हणून सुरू झालेली बाब पुढे गंभीर गुन्ह्यात परिवर्तित झाली. या दोघांनी मिळून अनेक तरुणींना जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, काही दिवसांनी या दोघांमध्ये पैशावरून वाद निर्माण झाला. याच वादातून रागाच्या भरात उझेरखानने अयानचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरुवात केली. या व्हिडिओंच्या माध्यमातूनच संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पोलिसांच्या तपासात हे समोर आले की, आरोपींनी एकूण 18 व्हिडिओ आणि 39 फोटो विविध माध्यमांवर प्रसारित केले होते. या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली. मुख्य आरोपी अयान अहमद हा आपल्या एका मित्राची खोली काही तासांसाठी भाड्याने घेत असे. त्या ठिकाणी तो मुलींना बोलावून त्यांच्यावर अत्याचार करत असल्याची कबुली त्याने दिली आहे. या प्रकरणात संबंधित मित्रालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या घटनांची पुष्टी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पीडित मुली अजून समोर आल्या नसल्या तरी तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक केली आहे. अयान अहमद आणि उझेरखान व्यतिरिक्त मोहम्मद साद मोहम्मद साबीर (वय 22) आणि तरबेज खान तसलिम खान (वय 24) यांचाही सहभाग समोर आला आहे. हे आरोपी व्हिडिओ शेअर करणे आणि प्रसारित करण्यामध्ये सक्रिय होते. याशिवाय आणखी काही संशयितांची चौकशी सुरू असून, आरोपींच्या जाळ्याचा विस्तार किती मोठा आहे याचा शोध घेतला जात आहे. कठोर कारवाईची गरज या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी 45 सदस्यांची विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली आहे. या प्रकरणातील प्रत्येक बाब तपासली जात असून, आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. समाजात वाढत चाललेल्या अशा विकृत प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. अमरावतीतील या घटनेने केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नच नव्हे, तर सामाजिक मूल्यांवरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. विशेषतः पुणे शहरात उष्णतेचा तडाखा अधिक जाणवत असून तापमान 40 ते 41 अंश सेल्सियस दरम्यान स्थिर आहे. लोहगाव परिसरात सलग दुसऱ्या दिवशी तापमान 42 अंशांवर पोहोचल्याने नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागांत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात 18 एप्रिलपर्यंत, मराठवाड्यात 16 ते 18 एप्रिलदरम्यान, तर विदर्भात 15 ते 19 एप्रिलदरम्यान उष्णतेची तीव्रता अधिक राहणार आहे. कोकण भागातही 17 एप्रिल रोजी काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी या काळात विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पुणेकरांसाठी थोडासा दिलासा देणारी बाब म्हणजे 18 आणि 19 एप्रिल रोजी शहरात आणि जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या हलक्या पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट होऊ शकते. मात्र, 16 ते 18 एप्रिलदरम्यान तापमानात मोठा बदल होणार नसून 19 ते 22 एप्रिलदरम्यान 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी आणि ओआरएसचे सेवन करणे आवश्यक आहे. हलक्या रंगाचे सैल सुती कपडे वापरणे, घराबाहेर पडताना टोपी किंवा छत्रीचा वापर करणे, तसेच शक्यतो सावलीत विश्रांती घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेषतः दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय काही गोष्टी टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. दुपारच्या वेळेत कष्टाची कामे करणे टाळावे, अनवाणी उन्हात चालू नये, तसेच मद्य, चहा, कॉफी आणि जास्त साखरयुक्त पेये कमी प्रमाणात घ्यावीत. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नये. कारखान्यांमध्ये, विशेषतः जास्त तापमान असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, कारण अशा परिस्थितीत उष्माघाताचा धोका वाढतो. सर्वाधिक परिणाम मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींवर उष्णतेचा सर्वाधिक परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींवर होऊ शकतो. त्यामुळे या घटकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. शरीरात जास्त घाम येणे, तहान वाढणे, त्वचा कोरडी पडणे, ताप वाढणे, चक्कर येणे किंवा उलटी होणे ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ रुग्णाला थंड ठिकाणी नेऊन जवळच्या रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
वॉशिंग्टन: अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव कमी करण्यासाठी आता हालचालींना वेग आला आहे. इराणसोबत होणाऱ्या दुसऱ्या फेरीच्या शांतता चर्चेसाठीआपण स्वतः पाकिस्तानला जाऊ शकतो, असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकं काय म्हणाले ट्रम्प? नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या संभाव्य चर्चेबाबत […] The post ‘तर मी स्वतः पाकिस्तानला जाईन’; इराणसोबतच्या दुसऱ्या शांतता चर्चेपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आश्विन नवले यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला. नवले यांनी राजीनामा पत्रात उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर थेट नाराजी व्यक्त केली आहे. राजीनामाचे पत्र त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. नवले यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे, की ‘साहेब, आपण विचारांची क्रांती केली तेव्हा सर्वप्रथम आपल्या सोबत अकोल्यातून येणारे आम्ही आहोत. पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे जिल्ह्यात काम केले परंतु गोपीकिशन बाजोरिया सारख्या विचारहीन व स्वार्थी वृत्तीच्या व्यक्तीसोबत काम करणे आता माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मनाला पटत नाही. आम्ही समाजसेवक आहोत व राहू. परंतु पक्षाच्या पदासाठी बाजोरिया यांचे गुलाम बनून राहू शकत नाही. माझा हा राजीनामा आपण स्वीकार करावा’ ‘बाजोरिया’सारख्यांच्या दावणीला पक्ष बांधला गेला असल्याने आणखी काही कार्यकर्ते राजीनामे देण्याचे मार्गावर आहेत, असेही या पत्रात म्हटले आहे. जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच प्रसिद्धी माध्यमांना माहिती देत नवले यांनी आपली भूमिका जाहीर केली. त्यामुळे हा विषय अधिकच चर्चेत आला आहे. दरम्यान, नवले यांच्या निर्णयावर कार्यकर्त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काहींनी त्यांच्या निर्णयाला समर्थन देत ‘स्वाभिमानासाठी घेतलेला निर्णय योग्य’ असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी पक्षनिष्ठेला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे. परिणामी, जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार

29 C