नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने (आयटीआय) महाराष्ट्रातील सर्व आयटीआयमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून या संस्थेची निवड करण्यात आली असून, त्यांना प्रशस्तीपत्रासह २ लाख रुपयांचा रोख पुरस्कारही मिळाला आहे. राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यभर एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल शुक्रवार, २७ मार्च रोजी घोषित करण्यात आला. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील कामकाजाच्या आधारे नांदगाव आयटीआयची निवड करण्यात आली, ज्यामुळे अमरावती जिल्ह्याची मान उंचावली आहे. संस्थेतील प्राचार्य, निदेशक आणि विद्यार्थी यांच्यातील योग्य समन्वयामुळे हे यश शक्य झाले. नाविन्यपूर्ण उपक्रम, अत्याधुनिक सुविधा आणि १०० टक्के प्रवेश क्षमता हे उद्दिष्ट संस्था दरवर्षी गाठते. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासोबतच प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर येथे विशेष भर दिला जातो. या संस्थेत स्मार्ट क्लासरूम, सर्वत्र सीसीटीव्हीची निगराणी, खेळाचे मैदान, जिम आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. तत्कालीन सहसंचालक प्रदीप घुले व विद्यमान सहसंचालक अनंत सोमकुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य नंदनसिंह भुकवाल यांच्या नेतृत्वात ही प्रगती साध्य झाली आहे. प्राचार्य भुकवाल यांनी सांगितले की, हा सन्मान संस्थेतील सर्वांनी केलेल्या सामूहिक कामाचा परिणाम आहे. नांदगाव खंडेश्वर आयटीआयला यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सन २०२१-२२ मध्ये संस्थेला विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामकाजाचा प्रथम पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २०२४ मध्ये मुंबईतील डिपेक्स राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनात आयटीआय गटातून शेतकरी मित्र या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला होता. विभागीय आणि राज्यस्तरावर सलग पुरस्कार पटकावणारी जिल्ह्यातील ही एकमेव आयटीआय ठरली आहे.
ममदापूर सरपंचपदाचे ‘ग्रहण’ अडीच वर्षांनी सुटले:30 मार्चला अधिसूचना, 28 एप्रिलला होणार मतदान
तिवसा तालुक्यातील आखतवाडा आणि वणी ममदापूर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाची निवडणूक अखेर अडीच वर्षांनंतर जाहीर झाली आहे. यामुळे आतापर्यंत सुरू असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, गावातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. प्रशासकीय सूत्रांनुसार, या निवडणुकीची अधिसूचना सोमवार, ३० मार्च रोजी जाहीर होईल. उमेदवारी अर्ज ७ ते १३ एप्रिल दरम्यान दाखल केले जातील. १५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल, तर १७ एप्रिल रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रत्यक्ष मतदान २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडेल. २९ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येईल. या निवडणुकीत थेट सरपंचपदासोबतच ग्रामपंचायतीतील ३ रिक्त सदस्यपदांसाठीही मतदान होणार आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात दोन वेळा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र विविध कारणांमुळे प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण होते. आता अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपद महिलांसाठी राखीव होते. मात्र त्यावेळी एकही उमेदवारी अर्ज न आल्याने निवडणूक होऊ शकली नव्हती. परिणामी सरपंचपद रिक्त राहिले आणि ग्रामपंचायतीचे कामकाज प्रशासकीय पातळीवरच चालत राहिले. वॉर्ड क्रमांक १ मधील महिलांसाठी राखीव असलेली एक जागासुद्धा उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्याने रिक्तच राहिली होती. आता दोन्ही पदांसाठी निवडणूक होत आहे. इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली असून, गावात राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रचाराचे वातावरण हळूहळू रंगू लागले आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराला नवे नेतृत्व मिळाल्याने विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
अमरावती: शहीदांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी देशहिताचे कार्य करावे लागेल, राष्ट्रीय एकात्मता व देशाची विविधता जपावी लागेल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून बुध्दीप्रामाण्यवादी व्हावे, असे आवाहन प्रा. मधुकर जाधव यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात शहीद दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने 'शहीदांच्या स्वप्नातील भारत' या विषयावर या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे होते. अधिसभा सदस्य नितीन टाले व कैलास चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. निलेश कडू आणि विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात प्रा. जाधव यांनी भगतसिंह यांच्यावर लाला लजपतराय यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता हे सांगितले. लाला लजपतराय यांच्या निधनानंतर भगतसिंह यांनी बदला घेतला. असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यामागे भारतीयांचे विचार ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हेतू होता, जीवितहानी करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. चंदनसिंहसारख्या ब्रिटिशांची चाकरी करणाऱ्यांनाही मारण्यात आले होते. भगतसिंह यांनी अटक करवून घेतल्यानंतर कारागृहात भारतीयांना दुय्यम वागणूक मिळत असल्याने त्यांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. ब्रिटिश काळात प्रत्येक बाबीसाठी भारतीयांना आंदोलन करावे लागत होते. बाबू गेणू यांनीही भारतातील कच्चा माल ब्रिटिशांना नेण्यास मनाई केली होती, असे दाखले प्रा. जाधव यांनी दिले. आजच्या युवकांनी आपल्या ज्ञानकौशल्याचा उपयोग समाजहित आणि देशहितासाठी करावा, शहीदांचे चरित्र वाचावे, विचार आत्मसात करावेत आणि ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला. अधिसभा सदस्य नितीन टाले म्हणाले की, क्रांतिकारकांनी तरुण वयातच सर्वस्वाचा त्याग करून देश स्वातंत्र्यासाठी लढा दिला. आजच्या तरुणांनी आपल्यासमोरील आव्हानांना सामोरे जावे. विद्यार्थीही समाजात परिवर्तन घडवून आणू शकतात, असे टाले यांनी नमूद केले. कैलास चव्हाण यांनी सांगितले की, ब्रिटिशांची सत्ता उलथवण्यासाठी क्रांतिकारकांनी मोठे बलिदान दिले. अवघ्या तेवीस वर्षांच्या वयात भगतसिंह यांनी अनेक पुस्तके वाचली आणि अभ्यास केला. लाला लजपतराय यांच्याकडून त्यांनी देशभक्तीचे धडे घेतले. युवकांनी पुस्तके वाचावीत, स्वप्न पहावीत आणि पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
अमरावती येथे नयना गुंडे रविवारी विभागीय आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. यापूर्वीच्या आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांची महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पदी नियुक्ती झाल्याने हे पद रिक्त झाले होते. नयना गुंडे या राज्याच्या महिला व बालविकास आयुक्त म्हणून पुण्यात कार्यरत होत्या. पुण्याहून अमरावती येथे पोहोचून त्या मध्यान्हपूर्व पदभार स्वीकारतील अशी माहिती आहे. वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ. श्वेता सिंघल यांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी अमरावतीच्या विभागीय आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या बदलीचा आदेश शुक्रवार, २७ मार्च रोजी धडकला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मेळघाट आणि अमरावती विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिला. महसूल खात्यात संगणकाचा प्रभावी वापर आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्याला त्यांनी प्राधान्य दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक व क्रीडा प्रकारातही चांगली प्रगती केली. नयना गुंडे यांनी यापूर्वी विदर्भात गोंदिया येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. त्या एक उत्कृष्ट सनदी अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का वाढावा यासाठी त्या नेहमीच आग्रही राहिल्या आहेत. अमरावती येथील प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीलाही त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी मदत केली आहे.
अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी एकही तालुका पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही. यामुळे प्रशासनाने ५४५ गावांना टंचाईग्रस्त घोषित केले असून, या गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी ७२२ विविध कामे निश्चित केली आहेत. या कामांसाठी जिल्हा प्रशासनाला १९ कोटी ७ लाख ५५ हजार रुपये खर्च येणार आहे. जिल्हा परिषदेने गेल्या महिन्यात प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयाकडून पाणीटंचाईच्या वास्तविकतेचा अहवाल मागवला होता. भूजल सर्वेक्षण विभागाने या अहवालाची पडताळणी करून उपाययोजनांची आखणी केली. या आखणीनुसारच १९.०७ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात पाण्याचे स्रोत मर्यादित असल्याने दरवर्षी विहिरींचे खोलीकरण, विहिरींचे अधिग्रहण आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा यांसारख्या उपाययोजना कराव्या लागतात. मात्र, यावर्षी जिल्ह्यातील सर्व चौदाही तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, विहिरींचे खोलीकरण, खासगी विहिरींचे अधिग्रहण, टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या नवीन नळ योजना, नवीन विंधन विहिरींची निर्मिती आणि स्रोतांचे बळकटीकरण अशा विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील काही गावांमध्ये हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईची झळ सुरू होते. त्यामुळे प्रशासनाने यापूर्वी ऑक्टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च असे दोन आराखडे तयार केले होते. परंतु, सर्वाधिक पाणीटंचाई उन्हाळ्यात जाणवत असल्याने, सध्याचा आराखडा जून २०२६ पर्यंतच्या कालावधीसाठी तयार करण्यात आला आहे. चिखलदरा तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याच्या स्रोतांच्या अभावामुळे दरवर्षी टँकर किंवा रस्त्याच्या स्थितीनुसार बैलगाडीने पाणीपुरवठा केला जातो. यावर्षीही १५ टँकर आणि बैलगाडीचा वापर करावा लागणार असून, त्यासाठी सुमारे ३० लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. अधिग्रहित विहिरींमधून या दूरच्या गावांना येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरू केला जाईल. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांनी सांगितले की, दरवर्षी काही गावांना बाहेरून पाणी पुरवावे लागते, त्यासाठी आराखडा तयार केला जातो. यावर्षी ५४५ गावांचा टंचाईग्रस्त गावांच्या यादीत समावेश आहे. मात्र, ही गावे कायमस्वरूपी टंचाईग्रस्त नसतात, तर दरवर्षी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे पुढील वर्षी त्यांना फायदा होतो. यामुळे काही गावांमध्ये स्रोतांचे बळकटीकरण होते आणि टंचाईचा कालावधीही कमी होतो.
रिम्पा शिवा यांचे तबला वादन तर पं. कुमार मर्डर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
लातूर : प्रतिनिधी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील संगीत विभागप्रमुख प्रा. हरिसर्वोत्तम जोशी व परिवाराच्या वतीने दि. २५ मार्च रोजी आयोजित ‘स्वर-तालनिनाद’ संगीत समारोह कोलकाता येथील प्रथितयश व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कलावंत विदूषी रिम्पा शिवा यांचे स्वतंत्र तबलावादन, धारवड (कर्नाटक), येथील पं. कुमार मर्डर यांचे शास्त्रीय गायन व लातूर येथील उदयोन्मुख तबलावादक समीहन जोशी यांच्या स्वतंत्र तबलावादनाने […] The post रिम्पा शिवा यांचे तबला वादन तर पं. कुमार मर्डर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
३ लिटर केरोसीन महिनाभर कसे पुरणार?
लातूर : प्रतिनिधी आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. शासनाने व्यावसायिक गॅस पुरवठा बंद केला आहे. या संकटामुळे निर्माण झालेली घरगुती गॅसची टंचाई दुर करण्यासाठी शासनाने आता केरोसीनचा पर्याय निवडला आहे. लातूर जिल्ह्यातील १ लाख ८ हजार किलोलिटर केरोसीनचा साठा मंजूर केला आहे. येत्या १० दिवसांत ग्रामीण भागातील रास्त भाव दुकानांमधून […] The post ३ लिटर केरोसीन महिनाभर कसे पुरणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जलकुंभ तयार, पाईपलाईन रखडली:19 गावे चार वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत; 35 कोटींची योजना अर्धवट
घाटलाडकी येथे चारगड धरणावरून १९ गावांना पाणी पुरवण्यासाठी ३५ कोटी रुपयांची जल जीवन मिशन योजना रखडली आहे. जलकुंभ तयार असूनही पाईपलाईनचे काम थांबल्याने गेल्या चार वर्षांपासून ही गावे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कंत्राटदाराची देणी थकल्याने योजनेचे काम मध्येच थांबले आहे. केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत २०२२-२३ मध्ये ही योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेमुळे परिसरातील १९ गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या एक वर्षापासून या योजनेचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. कंत्राटदाराची बिले प्रलंबित असल्याने त्यांनी काम बंद केले आहे. उन्हाळा सुरू झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिलांना आणि ग्रामस्थांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने त्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अमरावतीचे उप अभियंता अर्जुन भुंबर यांनी सांगितले की, १९ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे काम निधी अनुपलब्धतेमुळे अर्धवट अवस्थेत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत केंद्राचा निधी उपलब्ध नसल्यामुळे कंत्राटदाराची बिले प्रलंबित आहेत आणि त्यामुळे त्यांनी काम बंद केले आहे.
अमरावतीत ऑक्टोबरमध्ये राज्यस्तरीय ‘बुक फेअर’:पालकमंत्री बावनकुळे यांनी केली घोषणा
अमरावतीमध्ये ऑक्टोबर महिन्यात राज्यस्तरीय पुस्तक महोत्सव (बुक फेअर) आयोजित करण्यात येणार आहे. राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे. पालकमंत्री बावनकुळे यांनी आज, शनिवारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण केले. याचवेळी जिल्हास्तरीय पुस्तक महोत्सवाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील विविध ठिकाणी आयोजित केलेल्या पुस्तक महोत्सवांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादाला पाहूनच अमरावतीत राज्यस्तरीय बुक फेअर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, मानवी जीवनात पुस्तकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुस्तकांमुळे समाज प्रगल्भ होतो आणि अनेक क्रांती घडतात. त्यामुळे जिल्ह्यात वाचन चळवळ रुजवण्यासाठी 'गाव तिथे ग्रंथालय' हा उपक्रम राबवण्यात येईल. या उपक्रमांतर्गत गावांमध्ये असलेल्या विनावापर इमारतींची दुरुस्ती करून त्या ठिकाणी वाचनालये सुरू केली जातील.
मोझरी शेतशिवारात आग, गव्हाचे पीक जळून खाक:महावितरणच्या चुकीमुळे नुकसान झाल्याचा शेतकऱ्याचा आरोप
तिवसा तालुक्यातील मोझरी येथील शेतशिवारात दुपारी अचानक आग लागल्याने दोन एकर गव्हाचे पीक जळून खाक झाले. या घटनेत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी सुधीर होले यांनी महावितरणच्या चुकीमुळे आग लागल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास वाकलेल्या विद्युत खांबामधून ठिणग्या पडल्याने शेतात आग लागली. आगीची माहिती मिळताच शेतकरी सुधीर होले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र, कोरडे वातावरण, वाऱ्याचा वेग आणि पिकाची स्थिती यामुळे आग झपाट्याने पसरली. परिणामी, दोन एकर क्षेत्रातील गव्हाचे पीक पूर्णतः नष्ट झाले. घटनेनंतर महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित विभागाकडून पंचनामाही करण्यात आला असून नुकसानीचे मूल्यांकन सुरू आहे. शेतकरी सुधीर होले यांनी या प्रकरणी तिवसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने, संबंधित शेतकरी आणि परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे योग्य ती नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वाकलेले आणि धोकादायक विद्युत खांब तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
राज्यात सध्या सुरू असलेल्या तीव्र गॅस टंचाईचा फटका आता थेट मानवी जिवावर बेतू लागला आहे. एकीकडे कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झालेले असताना, दुसरीकडे स्वयंपाकाच्या गॅससाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. अशाच एका रांगेत उभ्या असलेल्या अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील एका ७० वर्षीय वृद्धाचा चक्कर येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. शंकरराव शिरसाट असे या मृत वृद्धाचे नाव असून, ते गावाचे माजी सरपंच होते. या घटनेमुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली आहे. अन्वी मिर्झापूर येथील यदुराज गॅस एजन्सीवर सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे देखील आपला नंबर लावण्यासाठी रांगेत उभे होते. एकीकडे भीषण उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे तासन्तास उभे राहिल्याने आलेला थकवा यामुळे त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. उपस्थित नागरिकांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. गावच्या माजी सरपंचाला एका गॅस सिलिंडरसाठी अशा प्रकारे जीव गमवावा लागल्याने अन्वी मिर्झापूर गावावर शोककळा पसरली आहे. व्यवस्थेतील त्रुटी आणि वितरणातील गोंधळामुळेच एका सामान्य नागरिकाचा बळी गेल्याची भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शिरसाटांच्या मृत्युला सरकारची नियोजनशून्यताच जबाबदार या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण होणार असल्याची पूर्वसूचना असतानाही सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. जर प्रशासनाने वेळेवर योग्य नियोजन केले असते, तर आज शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या मृत्यूला पूर्णपणे सरकारची नियोजनशून्यताच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा मी धिक्कार करतो. यापुढे गॅस सिलेंडरसाठी माणसे दगावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशी विनंतीही प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडे केली. नागरिकांची अग्निपरीक्षा राज्यात एकीकडे पारा ४० अंशांच्या वर गेल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे, तर दुसरीकडे घरगुती गॅससाठी भर उन्हात उभे राहावे लागत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस वितरणाचे वेळापत्रक कोलमडले असून, एजन्सी चालकांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. हे ही वाचा… गॅसचा तुटवडा नाही, तर रॉकेल का देताय?:भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले - अफवा पसरवण्यात भाजपचा हात कुणीच धरू शकत नाही राज्यातील इंधन टंचाई, गॅसचा तुटवडा आणि वाढत्या भोंदूगिरीच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः देशात कोरोनासारखी स्थिती पुन्हा उद्भवू शकते असे सांगून इशारा देत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील मुख्यमंत्री कशाचाही तुटवडा नसल्याच्या बढाया मारत आहेत, अशा शब्दांत जाधवांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील विसंगतीवर बोट ठेवले. तसेच गॅसचा तुटवडा नाही म्हणता, मग केरोसिन का देता? असा सवाल करत, अफवा पसरवण्यात भाजपचा कोणीही हात धरू शकत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. सविस्तर वाचा…
व्यापक जनसंपर्काच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचणार
लातूर : प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष असले तरी उत्सव साजरा करावा, असे काहींही नाही. कारण आणखी बरीच कामे राहिली आहेत. ती कामे आता संघाने प्रामुख्याने हाती घेतली असून व्यापक जनसंपर्काच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोंचणार, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांनी सांगीतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रमोद बापट लातूर येथे […] The post व्यापक जनसंपर्काच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांचा सन्मान
लातूर : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राबविलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणा-या राज्यातील पहिल्या पाच जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थान पटकावले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा शनिवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात सन्मान करण्यात आला. यावेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री […] The post मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांचा सन्मान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘बीएलओं’कडे माहिती न दिल्यास नाव वगळले जाणार
लातूर : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनामार्फत मतदार यादीचे विशेष सघन पुनरावलोकन (एसआयआर) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत मतदारांनी ‘बीएलओ’कडे माहिती न दिल्यास मतदार यादीतील नाव वगळले जाण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील अस्पष्ट फोटो, दुबार नावे आणि ‘एसआयआर […] The post ‘बीएलओं’कडे माहिती न दिल्यास नाव वगळले जाणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण, समाजकल्याण आणि इतर दोन विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक येत्या ४ एप्रिल रोजी होणार असून, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. या पार्श्वभूमीवर २० मार्च रोजी झालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती आणि प्रशासनाची नामुष्की टाळण्याचे मोठे आव्हान आता जिल्हा प्रशासनासमोर उभे आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपने बहुमत नसतानाही अनपेक्षितपणे विजय खेचून आणला खरा, मात्र त्यावेळी झालेल्या गोंधळ आणि मंत्र्यामंत्र्यांमध्ये आणि पोलीस मंत्र्यांमध्ये जिल्ह्याची संपूर्ण राज्यामध्ये मोठी नाचक्की झाली. या संघर्षाची आग अजूनही शांत झालेली नसतानाच आता पुन्हा एकदा सातारा जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दि ४ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडेल. यापूर्वीच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असताना, आता ४ एप्रिलला जिल्हाधिकारी जिल्हा परिषद परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करणार काय याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ जागांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले होते.ज्याचा निकाल ९ फेब्रुवारीला जाहीर झाला. या निकालात २७ जागांसह भाजप जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. तर राष्ट्रवादी काँग्रेसला २० आणि शिवसेना (शिंदे गट) १५ जागांवर विजय मिळवता आला. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती असली तरी, जिल्ह्यात मात्र ही युती न झाल्याने भाजप विरुद्ध शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी असा तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. प्रचारादरम्यान एकमेकांवर झालेल्या जहरी टीकेमुळे निकालानंतरही भाजप आणि मित्रपक्षांत युती होण्याची शक्यता मावळली होती. मात्र, कोणत्याही परिस्थितीत सत्ता स्थापन करण्याचा चंग भाजपने बांधला होता. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ३३ सदस्यांचे पाठबळ मिळवण्यासाठी साम-दाम-दंड-भेदाचा वापर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. सत्ता स्थापनेच्या दिवशी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांना सुरक्षित स्थळावरून बसद्वारे जिल्हा परिषदेत आणले जात असताना भाजपने नाट्यमयरित्या दोन सदस्यांवर अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना जिल्हा परिषदेच्या दारात पोहोचताच पोलिसांनी ताब्यात घेतले. या गोंधळात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे आरोप झाले. प्रचंड गदारोळात राष्ट्रवादीच्या एका सदस्याचा हात जबरदस्तीने वर करून भाजपने सत्ता हस्तगत केली, ज्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. ही घटना ताजी असतानाच आता आहे. जिल्हा परिषदेत सभापती निवड होत असल्याने पुन्हा बहुमताचा विषय येणार असल्याने भाजपा आणि शिवसेना राष्ट्रवादी यामधील संघर्ष होणार की चर्चेद्वारे सभापती निवडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून उलट आमचेच अपहरण करत खूनाचा प्रयत्न करणाऱ्या संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले. सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांची भेट घेतल्यानंतर जिल्हाधिकारी पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यानंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी ही माहिती दिली. अनिल देसाई म्हणाले, ''ज्यांचे अपहरण झाले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला त्या बापूसाहेब शिंदे यांनी त्या दिवशी प्रत्यक्ष मतदानात सहभागी होत मतदान केले होते. तसेच त्यांनी पोलिसांसमोर आपले अपहरण झाले नसल्याचा जबाब दिला आहे. त्यामुळे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून मारहाण करणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.'' ते पुढे म्हणाले की, ''या प्रकरणी न्यायालयानेही योग्य तो आदेश दिलेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्या आदेशानुसार त्वरित कारवाई करावी. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनाही यासंदर्भात निवेदन देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.'' अनिल देसाई यांनी स्पष्ट केले की, संबंधितांवर कारवाई करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी जावे लागेल तेथे जाणार असून, प्रसंगी उच्च न्यायालयातही दाद मागणार आहोत. ''कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,'' असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यातील शेतकरी आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून राष्ट्रवादी किसान सभा काम करणार असून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष वसंत मानकर यांनी शनिवारी ता. २८ दिली आहे. राष्ट्रवादी किसान सभा पदाधिकारी व शेतकरी संवाद मेळावा सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वसंत मानकर यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, वसंत मस्के,राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा प्रदेश सरचिटणीस गणेश डोंगरे, किसान सभेचे मराठवाडा अध्यक्ष रामभाऊ हांडोळे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, रवींद्र गडदे, अशोक शिरामे, रवी डोरले, विकास शिंदे, अजय भूतनर यांच्यासह अनेक कार्यकते उपस्थित होते. यावेळी मानकर म्हणाले की, किसान सभा ही संघटना राज्यात शेतकरी आणि सरकार त्यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करून त्यावर शासनाच्या माध्यमातून उपाययोजना राबवण्यासाठी किसान सभा सक्रिय भूमिका बजावेल. शेतकरी व सरकार त्यांच्यात समन्वय साधत त्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. या प्रश्नासंदर्भात लवकरच शासन स्तरावर संबंधित विभागांना कळविले जाईल. यातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या आदेशानुसार हिंजवडी येथील मे. श्री लक्ष्मी भारतगॅस या गॅस एजन्सीला व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा व वितरण तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या एजन्सीकडे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मार्फत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर विक्रीचा अधिकृत परवाना आहे. मात्र, दि. २६ मार्च २०२६ रोजी सिलेंडर वितरण करताना शासनाने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमाचे पालन न करता अनधिकृत व नोंदणी नसलेल्या व्यक्तींना सिलेंडर वाटप केल्याचे आढळले. तसेच अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने जादा दराने सिलेंडर विक्री केल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एलपीजी पुरवठ्याबाबत गैरसमज निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार संबंधित एजन्सीचा परवाना निलंबित करण्यात येत आहे. तसेच, या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) यांना दिले आहेत. भाजप नेत्याच्या पंपावर कारवाई दरम्यान, इंधन उपलब्धतेबाबत अप्रमाणित माहिती पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण केल्याप्रकरणी पुणे कॅन्टोनमेंट परिसरातील हायवे पेट्रोलियम सेंटर (पूलगेट) या पेट्रोल पंपावरील विक्री व इंधन पुरवठा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे. संबंधित पेट्रोल पंप हा भाजप नेते आणि ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे कोर कमिटी मेंबर अली दारूवाला यांचा आहे. याबाबत अली दारूवाला यांना विचारणा केली असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तेल कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित पेट्रोल पंपाकडून पेट्रोल व डिझेल तुटवड्याबाबत निराधार अफवा पसरविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाइन्स २०२४ अंतर्गत “गंभीर अनियमितता” म्हणून गणली जाते. डीलरशिप करारातील अटींचे उल्लंघन झाल्याने संबंधित कारवाई करण्यात आली आहे.
शेतात मिरची तोडत असताना अचानक पट्टेदार वाघाने महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना २८ मार्च रोजी सकाळच्या सुमारास उमरझरी येथे घडली. माया रामकृष्ण सोनवाणे (वय ५५,रा. उमरझरी, ता.साकोली) असे जखमी महिलेचे नाव आहे. शनिवार दिनांक २८ मार्चला सकाळी नऊ वाजता शेतात मिरच्या तोडत असताना पट्टेदार वाघाने अचानक महिलेवर हल्ला करून जखमी केले. जवळच काम करणारे तिचे पती रामकृष्ण सोनवाणे यांनी जोराने आरडाओरडा केली. लगेच आजूबाजूच्या शेतात काम करणारे सर्व शेतकरी धावून आल्याने वाघ पळाला. परंतु यात माया सोनवणे या वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उमरझरी येथील सोनवणे यांची जंगलालगत अर्धा एकर शेतजमीन असून त्यांनी त्यात मिरचीचे पिक लावले आहे. सध्या मिरची तोडण्याचा हंगाम सुरू असून सकाळी आठ वाजता माया सोनवणे व तिचे पती हे दोघेही शेतात मिरच्या तोडत असताना अचानक वाघाने माया सोनवणे यांच्यावर हल्ला केला. गळ्याला, हाताला व कानाला तसेच पाठीला नखाने ओरडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलेला वनविभागाकडून उपचारासाठी १० हजार रुपये तत्काळ देण्यात आले आहेत. उमरझरी बीट अंतर्गत येणाऱ्या शेतात भरदिवसा वाघांनी हल्ला केल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांतील दुसरी घटना दरम्यान, दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. याआधी १९ मार्च रोजी याच परिसरातील बांपेवाडा येथील वसंता मेश्राम हे मोहफूल वेचायला गेले असता त्यांना वाघाने हल्ला करून ठार केले होते. वाघाला पकडण्यासाठी वनविभाग ॲक्शन मोडवर बांपेवाडा येथील वसंता मेश्राम यांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या नरभक्षी वाघानेच हा हल्ला केला असल्याचा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे. या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी परिसरात पिंजरे लावण्यात आले असून मचाण उभारण्याचे काम सुरू आहे. सोबतच ट्रॅप कॅमेरे व लाईव्ह कॅमेरे सुद्धा लावण्यात आले असल्याचे वन विभागाने सांगितले. शीघ्र कृती दल भंडाराचे शार्पशूटर व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून वाघाचा शोध घेणे सुरू असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.
पुणे, प्रतिनिधी: देशभरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, पुण्यातील रामवाडी येथील एका मुस्लिम कुटुंबाने सर्वधर्म समभावाचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. खान कुटुंबाची तिसरी पिढी गेल्या अनेक वर्षांपासून रामनवमी उत्सवात सक्रिय सहभाग घेत आहे. रामवाडीतील राम मंदिरात साजरा होणाऱ्या या उत्सवात इक्रम खान हे मनापासून सहभागी होतात. त्यांच्या कुटुंबाची ही परंपरा १९३२ सालापासून सुरू आहे. त्यांचे आजोबा मोसा खान आणि वडील इसा खान यांनीही या उत्सवात सातत्याने सहभाग घेत विविध प्रकारे सहकार्य केले होते. हीच परंपरा पुढे नेत, पुणे गोल्फ क्लबचे कॅप्टन आणि उद्योजक इक्रम खान तसेच त्यांचे पुत्र अहद इक्रम खान यांनीही उत्सवात सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या या सहभागामुळे समाजात एकोपा आणि सौहार्द वाढीस लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीत सर्वधर्म समभाव, एकात्मता आणि बंधुभावाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत असताना, खान कुटुंबाने जपलेली ही परंपरा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. विविध धर्मामध्ये सामाजिक सलोखा रावा यादृष्टीने हे पाऊल स्वागतार्ह आहे. त्यांच्या या कार्याचे स्थानिक नागरिकांसह विविध स्तरांतून कौतुक होत आहे. या उत्सवाच्या वेळी संतोष देवकर, सुहास मल्लाव, विजय शितोळे, शांतीलाल गलांडे, प्रसाद देवकर, तोळेश्वर देवकर, दत्तात्रय देवकर, विजय देवकर, गोविंद गलांडे, विजय गलांडे, संदीप कांबळे, आकाश देवकर, अभिनव देवकर, कुणाल देवकर, आकाश गलांडे यांच्यासह पुणे शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना मदत करण्याच्या उपक्रमांतर्गत एका नवजात बाळाच्या उपचारासाठी आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. डॉ. रिंकू मोरे-बावसकर यांच्या प्रयत्नांमुळे बाळाच्या उपचाराचे ₹१.२५ लाखांचे बिल कमी होऊन ते केवळ ₹१५ हजार झाले. पूजा रोहित मुळे यांच्या नवजात बाळाला गंभीर अवस्थेमुळे एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, बाळाचे एकूण बिल सुमारे ₹१.२५ लाख इतके झाले होते, जे मुळे कुटुंबासाठी भरणे शक्य नव्हते. या कठीण परिस्थितीत, वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर सेल अध्यक्ष, पुणे येथील डॉ. रिंकू मोरे-बावसकर यांनी तत्परतेने पुढाकार घेतला. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा केली आणि मानवी दृष्टिकोनातून हे प्रकरण मांडले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि हॉस्पिटल प्रशासनाने बिलात मोठी सवलत दिली. यामुळे एक लाख पंचवीस हजार रुपयांचे बिल कमी होऊन कुटुंबाला केवळ ₹१५ हजार इतकीच रक्कम भरावी लागली. दिलासादायक बाब म्हणजे, नवजात बाळाची प्रकृती सुधारली असून त्याला यशस्वीरित्या डिस्चार्ज देण्यात आला आहे. या मदतीमुळे मुळे कुटुंबाने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि डॉ. रिंकू मोरे-बावसकर यांचे आभार मानले आहेत. नवजात बाळाचे वडील रोहित मुळे यांनी सांगितले की, अत्यंत कठीण प्रसंगी त्यांनी आम्हाला मोठा आधार दिला. त्यांच्या मदतीमुळे आमच्या बाळाला नवजीवन मिळाले आणि आम्हाला आर्थिक दिलासा मिळाला. ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरली आहे.
पुणे विमानतळ देशात अव्वल:प्रवासी समाधान आणि सेवा गुणवत्तेत पटकावला प्रथम क्रमांक
देशातील सर्व विमानतळांवर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवांची गुणवत्ता आणि त्यांच्या समाधानाबाबत झालेल्या सर्वेक्षणात पुणे विमानतळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यात पुणे विमानतळ देशात सर्वोत्तम ठरले आहे. सातत्यपूर्ण सेवा सुधारणा, प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सुविधा आणि कार्यक्षम व्यवस्थापनामुळे पुणे विमानतळाने हा बहुमान मिळविला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, पुणे विमानतळाने सेवा गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत गोवा विमानतळाला द्वितीय, तर इंदूर विमानतळाने तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे पुणे विमानतळाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. देशातील सर्व विमानतळांवर 'एसीआय-एसीक्यू सर्व्हे २०२५' (एअरपोर्ट क्वालिटी सर्व्हे) करण्यात आला. हे सर्वेक्षण पूर्णपणे प्रवाशांच्या अनुभवावर आधारित होते. यामध्ये विमानतळावरील स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश प्रक्रिया (चेक-इन), कर्मचारी वर्गाची वर्तणूक, उपलब्ध सोयी-सुविधा आणि समाधान अशा विविध निकषांचा विचार करण्यात आला. या सर्व आघाड्यांवर पुणे विमानतळाने बाजी मारली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ३१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, ३१ मार्च २०२६ रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. या वेळी पुणे विमानतळाच्या अधिकाऱ्यांना विशेष सन्मानित केले जाणार आहे. याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, 'पुणे विमानतळाने देशात प्रथम क्रमांक मिळवणे ही अभिमानाची बाब आहे. प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. आगामी काळातही पुणे विमानतळ प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध राहील.'
भोंदू अशोक खरात प्रकरणात नाव ओढले गेल्याने शिवसेना नेते आणि आमदार दीपक केसरकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक नेत्यांचे खरातसोबतचे फोटो समोर आले आहेत, मात्र केवळ ओळख असणे म्हणजे संबंधित व्यक्तीच्या कृत्यात सहभागी असणे असा होत नाही, अशा शब्दांत केसरकर यांनी आपले स्पष्टीकरण दिले. या प्रकरणाशी आपला संबंध जोडण्याचा प्रयत्न हा केवळ राजकीय द्वेषापोटी केला जात असून, यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आघाडीवर असल्याचा थेट आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. आमदार दीपक केसरकर यांचा नाशिकच्या बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात संबंध असल्याचा आरोप होत आहे. दीपक केसरकर यांचे अशोक खरात याच्यासोबतचे काही फोटो देखील समोर आले आहेत. दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना, त्यांच्या खात्यातील कारभार हा अशोक खरात याच्या सांगण्यावरून होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. आता दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचा समाचार घेतला आहे. नेमके काय म्हणाले दीपक केसरकर? दीपक केसरकर म्हणाले, मी देवभक्त आहे, मी न चुकता शिर्डीला येतो. ते जे ईशान्येश्वर मंदिर आहे ते शिर्डीला येण्याच्या वाटेवर आहे. मी लहान असल्यापासून दर सोमवारी शिव मंदिरात जातो. शिर्डीला आल्यानंतर कुठल्या शिव मंदिरात जायचे? तर मग ईशान्येश्वर मंदिरात जाणे झाले, त्या निमित्ताने ओळख झाली. ओळख आहे म्हणजे त्यांच्या कुठल्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असे नाही. त्यांना वाचवण्यासाठी माझा एखादा फोन गेला असेल, तर मी दोषी आहे. पण त्यांच्याकडून जे चुकीचे कृत्य घडलेले आहे त्याची शिक्षा त्यांना झाली पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. 39 आमदार भेटून गेलेले असताना माझेच नाव का? मी कुठलीही पूजा केलेली नाही. मी फक्त ईशान्येश्वरमध्ये एकदा पूजा केली आहे. याच्या पलीकडे मी कुठलीही पूजा त्यांच्या वतीने केलेली नाही. निव्वळ ओळख असल्याबद्दल एकाबद्दल काहीतरी बोलणे चुकीचे आहे. इतकी लोकं भेटून गेले, जवळजवळ ३९ आमदार भेटून गेले, मग माझंच नाव का? हा प्रश्न आहे. अनेक लोक भेटायला येतात, त्यामुळे कोणासोबत फोटो काढले म्हणजे तो चुकीचा माणूस आहे असे होत नाही. आपल्या नावाचा वापर करून गैरसमज पसरवू नयेत, असे दीपक केसरकर म्हणाले. राजकीय द्वेषापोटी लक्ष्य केल्याचा दावा या प्रकरणाचा संबंध आपल्याशी जोडण्यामागे 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' पक्षाचे नेते, विशेषतः संजय राऊत यांचा हात असल्याचा थेट आरोप केसरकर यांनी केला. ज्यावेळी शिवसेनेत संघर्ष झाला, त्यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू मांडून विरोधकांचे मनसुबे उधळून लावले होते. त्याचा राग मनात धरून आता माझ्याबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे, असे ते म्हणाले. खरातचे कृत्य अत्यंत घृणास्पद असून त्याला कठोर शिक्षा व्हायलाच हवी, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. ठाकरे गटाचा दुटप्पीपणा उघड दीपक केसरकर यांनी यावेळी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्यांनी खरातच्या मंदिराला पाण्याची लाईन दिली, निधी उपलब्ध करून दिला, तेच लोक आज माझ्यावर बोट दाखवत आहेत. त्यांनी केले तर योग्य आणि आम्ही मंदिरात गेलो तर चुकीचे, हा दुटप्पीपणा आहे, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला. खरातच्या गुन्ह्यांची कोणतीही माहिती आपल्याला नव्हती, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार? आपल्या स्वच्छ प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दीपक केसरकर यांनी कायदेशीर इशारा दिला आहे. या प्रकरणात एकदा खरातवर आरोपपत्र दाखल झाले की, माझी खोटी बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कोणती कायदेशीर कारवाई करायची, याबाबत मी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे. सार्वजनिक जीवनातील प्रतिमा मलीन करणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा केसरकर यांनी दिला.
राज्यातील इंधन टंचाई, गॅसचा तुटवडा आणि वाढत्या भोंदूगिरीच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः देशात कोरोनासारखी स्थिती पुन्हा उद्भवू शकते असे सांगून इशारा देत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील मुख्यमंत्री कशाचाही तुटवडा नसल्याच्या बढाया मारत आहेत, अशा शब्दांत जाधवांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील विसंगतीवर बोट ठेवले. तसेच गॅसचा तुटवडा नाही म्हणता, मग केरोसिन का देता? असा सवाल करत, अफवा पसरवण्यात भाजपचा कोणीही हात धरू शकत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक तणावाचा परिणाम भारताच्या इंधन पुरवठ्यावर होत आहे. राज्यातील विविध शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. एलपीजी सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. एलपीजी संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने आता केरोसिन देण्यात येणार आहे. तर देशात आणि राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, एलपीजी गॅस आणि पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. यावरून भास्कर जाधव यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. नेमके काय म्हणाले भास्कर जाधव? राज्यातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरून सरकारला जाब विचारताना भास्कर जाधव म्हणाले की, आज अनेक ठिकाणचे पेट्रोल पंप बंद आहेत आणि गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. जर तुमच्याकडे साठा भरपूर आहे, तर मग राज्यात बंद असलेले केरोसिन रेशनवर देण्याचा निर्णय सरकारने का घेतला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या विधानांमध्ये मोठी तफावत असून, जनतेची दिशाभूल करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. नेहरू-ठाकरेंना जबाबदार न धरल्यामुळे धन्यवाद काँग्रेसच्या काळात साडेतीनशे रुपयांना मिळणारा गॅस आज बाराशे रुपयांच्या पार गेला असूनही भाजपवाले केवळ काँग्रेसवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. आजच्या परिस्थितीला नेहरू किंवा उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असे भाजपने अद्याप म्हटले नाही, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असा उपरोधिक टोलाही भास्कर जाधव यांनी लगावला. देशात २०१४ पासून भोंदूगिरीला खतपाणी राज्यातील वाढत्या भोंदूगिरीच्या प्रकरणांनाही भास्कर जाधव यांनी थेट भाजपच्या विचारसरणीशी जोडले. २०१४ पासून देशात अंधश्रद्धेला जाणीवपूर्वक खतपाणी घातले जात असून, त्यातूनच भोंदूबुवा आणि तथाकथित साधू-महाराजांचे पेव फुटल्याचे त्यांनी नमूद केले. अनेकांना वाटते की बाबा-बुवांच्या पाया पडल्याशिवाय सत्तेचा मुकुट मिळणार नाही. राजकारण्यांच्या अशा वर्तनामुळे सर्वसामान्य जनतेमध्येही चमत्कारांवर विश्वास ठेवण्याची चुकीची प्रवृत्ती बळावत आहे. सिन्नरचे अशोक खरात प्रकरण हा याच विकृत मानसिकतेचा एक भाग आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. राजसत्ता आणि धर्मसत्तेची गल्लत भास्कर जाधव यांनी राजसत्ता आणि धर्मसत्ता या वेगवेगळ्या असायला हव्यात, असे मत व्यक्त केले. जेव्हा राजकारणी आपल्या सत्तेसाठी धर्माचा आणि अंधश्रद्धेचा वापर करतात, तेव्हा त्यांचा विवेक नष्ट होतो. अशा अघोरी प्रवृत्तींमुळे राज्याची प्रतिमा मलीन होत असून, सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी आणि जनतेला इंधन टंचाईतून दिलासा मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलिस दलाने २०० पैकी १४५ गुण मिळवत राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात या दलाने प्रथम क्रमांक मिळवला. मुंबईतील सह्याद्री सभागृहात आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा गौरव करण्यात आला. या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलिस विभागातील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवांचे मूल्यमापन करण्यात आले. डिजिटल प्रणालींचा वापर, ऑनलाइन सेवा, डेटा व्यवस्थापन, डॅशबोर्ड मॉनिटरिंग आणि तंत्रज्ञानाधारित निर्णयप्रक्रिया या घटकांवर विशेष भर होता. पुणे ग्रामीण पोलिस दलाने विविध डिजिटल प्रणालींची प्रभावी अंमलबजावणी केली. सीसीटीएनएस प्रणालीद्वारे एफआयआर नोंदणी, गुन्ह्यांची माहिती, तपास प्रगती आणि आरोपींची माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाली. यामुळे सर्व पोलिस ठाण्यांमध्ये रिअल-टाइम डेटा शेअरिंग सुलभ झाले आहे. 'आपले सरकार' पोर्टल अंतर्गत पुणे ग्रामीण पोलिस दलाने नागरिकांसाठी १७ विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे नागरिकांना घरबसल्या अर्ज करणे, प्रमाणपत्रे मिळवणे आणि विविध सेवा सहजपणे घेणे शक्य झाले. 'आपले सरकार ग्रीव्हन्स' प्रणालीद्वारे प्राप्त तक्रारी व अर्जांचा १४ दिवसांच्या आत निपटारा केला जात आहे. ई-ऑफिस प्रणालीमुळे कागदविरहित प्रशासनाला गती मिळाली. सर्वाधिक प्रकरणांचा जलद निपटारा करण्यात पुणे ग्रामीण पोलिस दल अग्रस्थानी राहिले. यामुळे कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमता वाढली आहे. व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणालीद्वारे नागरिकांना २४x७ तत्काळ माहिती, तक्रार नोंदणीची सुविधा आणि सेवा स्थिती तपासण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यामुळे संवाद अधिक जलद व सुलभ झाला. इंटिग्रेटेड डॅशबोर्ड आणि अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून पुणे ग्रामीण पोलिस दलाची संपूर्ण माहिती, कामगिरी, गुन्हेगारी आकडेवारी आणि विविध सेवा नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे पारदर्शकता अधिक बळकट झाली आहे. जीआयएस प्रणालीअंतर्गत रात्रगस्त दरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अचूक लोकेशन ट्रॅक करणे शक्य झाले आहे. यामुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत जवळचे पोलिस ठाणे सहज ओळखता येते आणि तात्काळ मदत मिळते. डायल ११२ आपत्कालीन सेवा अंतर्गतही उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली आहे. कमी वेळेत नागरिकांना प्रतिसाद देण्यावर विशेष भर दिल्याने आपत्कालीन सेवांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या “पोलिस पॅड” प्रणालीद्वारे ४ ते १० हजार लोकसंख्या असलेल्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अचूक मनुष्यबळ नियोजन करण्यात आले. या प्रणालीमुळे योग्य ठिकाणी योग्य पोलिस कर्मचारी तैनात करणे शक्य झाले असून, भीमा-कोरेगाव तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यांसारखे मोठे बंदोबस्त अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले.संदीप सिंह गिल, पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली “६० Days” आणि “९० Days” पायलट प्रकल्प राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा, सेवा वितरणातील गती आणि अंतर्गत समन्वय सुधारण्यात महत्त्वाची प्रगती झाली आहे. पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम पोलिस प्रशासन उभारणे ही काळाची गरज असून, पुणे ग्रामीण पोलिस दल या दिशेने सातत्याने प्रयत्नशील राहील. ही कामगिरी संपूर्ण पुणे ग्रामीण पोलिस दलासाठी अभिमानास्पद असून, राज्यातील इतर पोलिस दलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे,असेही गिल म्हणाले.
किल्ले रायगड येथे १ आणि २ एप्रिल २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची ३४६ वी पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आणि दुर्गसंवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९५ साली स्थापन केलेल्या या मंडळाने १९२५-२६ मध्ये रायगडावरील शिवछत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार केला होता. त्या कार्याला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असल्याने, ही परिषद विशेष महत्त्वाची ठरली आहे. या कार्यक्रमासाठी राज्यसभेचे खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक आनंद पाळंदे यांना 'श्रीशिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. तसेच, नागपूरकर भोसले घराण्याचे वंशज श्रीमंत मुधोजीराजे भोसले आणि निवृत्त ब्रिगेडीयर संग्राम मोहिते यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. शाहीर विक्रम अवचिते यांचा शाहिरी कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. शिवपुण्यतिथीच्या आदल्या दिवशी दुर्गसंवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत प्रा. प्र. के. घाणेकर, डॉ. सचिन जोशी आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांची सत्रे व मार्गदर्शन होणार आहे. मान्यवरांच्या मुलाखतींचाही यात समावेश करण्यात आला असल्याचे आयोजक यांनी सांगितले आहे. कार्यक्रमासाठी रायगडावर न्याहरी, भोजन, निवास, स्वच्छतागृहे आणि महिलांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन करावे, असे आवाहन मंडळाचे पदाधिकारी पांडुरंग बलकवडे आणि सुधीर थोरात यांनी केले आहे.
पुणे जिल्हा परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या मूल्यमापनात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. परिषदेला २०० पैकी १९६.२५ गुण मिळाले आहेत. तसेच, 'सेवाकर्मी' कार्यक्रमातही जिल्हा परिषदेची प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. या यशाबद्दल मुंबईतील सह्याद्री सभागृहात आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यात आले होते. यामध्ये कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर तसेच भौगोलिक माहिती प्रणाली या सात महत्त्वाच्या घटकांवरील कामगिरी विचारात घेण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेने डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात अनेक अभिनव उपक्रम राबवले आहेत. यामुळे नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा उपलब्ध झाल्या आहेत. इंटिग्रेटेड वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम, 'स्पंदन', ई-लॉटरी, सिस्टिम ऑफ पेन्शन इलस्ट्रेशन आणि क्यूआर कोड आधारित कर संकलन प्रणाली यांसारख्या नाविन्यपूर्ण प्रणाली जिल्हा परिषदेने विकसित केल्या आहेत. परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ द्विभाषिक, सुरक्षित आणि सुलभ असून, नागरिकांना सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळतात. 'आपले सरकार' प्रणालीत १०० टक्के सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ई-ऑफिस प्रणालीमुळे कागदविरहित प्रशासनाला गती मिळाली असून, हजारो नस्ती जलद निकाली काढण्यात आल्या आहेत. तसेच, इंटिग्रेटेड स्मार्ट डॅशबोर्डद्वारे डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया सक्षम झाली आहे. 'पुणे झेडपी संवाद' या व्हॉट्सअॅप एआय चॅटबॉटद्वारे नागरिकांना २४x७ माहिती व सेवा मिळत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ब्लॉकचेन आणि जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करून मालमत्ता व्यवस्थापन, आरोग्य सेवा आणि विकास नियोजन अधिक प्रभावी करण्यात आले आहे. या यशाबद्दल बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, 'डिजिटल प्रशासन ही काळाची गरज आहे. पुणे जिल्हा परिषद नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनासाठी सतत प्रयत्नशील राहील आणि राज्यातच नव्हे तर देशातही एक आदर्श मॉडेल म्हणून उभी राहील.' पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले, 'पुणे जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा सन्मान केवळ गुणांचा नाही, तर नागरिककेंद्रित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशासनाच्या आपल्या वचनबद्धतेचा गौरव आहे. भविष्यातही नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध राहील.'
कन्नड संघाच्या डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलमध्ये सुरेश कलमाडी स्पोर्ट्स सेंटर आणि नव्याने विकसित क्रीडा मैदानाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या गणेशनगर येथील शाळेत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुरेश कलमाडी यांच्या पत्नी मीरा कलमाडी, कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे, सचिव मालती कलमाडी, उपाध्यक्ष इंदिरा सालियन, डॉ. नारायण हेगडे, अद्विक फाउंडेशनचे आदित्य भारतीय आणि पायल कलमाडी-भारतीय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरेश कलमाडी यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी हे स्पोर्ट्स सेंटर सुरू करण्यात आले आहे. पुणे शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात ओळख मिळवून देण्यात कलमाडी यांचे मोठे योगदान होते. यामध्ये पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन, महाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा नगरीची निर्मिती आणि २००८ च्या कॉमनवेल्थ युथ गेम्सचे यजमानपद मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या सेंटरमध्ये दोन अत्याधुनिक बास्केटबॉल कोर्ट तयार करण्यात आले आहेत. डॉ. कलमाडी शामराव शाळेतील या क्रीडा मैदानासाठी अद्विक फाउंडेशनने ६५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. सुरेश कलमाडी यांचे वडील डॉ. शामराव कलमाडी यांनी पुण्यात स्थायिक झालेल्या कन्नड कुटुंबातील मुलांना मातृभाषेत शिक्षण मिळावे या उद्देशाने कन्नड संघाची स्थापना केली होती. यावेळी बोलताना मीरा कलमाडी यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार राहिलेल्या सुरेश कलमाडी यांना खेळाची खूप आवड होती. त्यांनी पुण्यात प्रथम मॅरेथॉन स्पर्धा सुरू केली, ज्यात सुरुवातीला ३०० जणांनी सहभाग घेतला होता. कालांतराने या स्पर्धेची लोकप्रियता वाढली आणि खेळाडूंची संख्या तीन लाखांपर्यंत पोहोचली. मुलांनी खेळात सहभागी होऊन देशाचे नाव मोठे करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मालती कलमाडी म्हणाल्या, मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे हा संस्थेचा उद्देश आहे. खेळाच्या माध्यमातून मुलांना मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते. ही सुविधा एक पायलट प्रोजेक्ट असून, कालांतराने संस्थेच्या इतर शाळांमध्येही त्याचा विस्तार करण्यात येईल. मुलांमधील क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अद्विक फाउंडेशनचे आदित्य भारतीय यांनी स्पष्ट केले की, भारतामध्ये क्रीडा संस्कृती वाढविण्यात सुरेश कलमाडी यांचे मोठे योगदान राहिले आहे. खेळामुळे करिअरला आकार मिळण्यास मदत होते आणि खेळात एक वेगळी ताकद असते.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) द्वारे आयोजित 'नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज हॅकॅथॉन २०२६' स्पर्धेत पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (PCCoE) च्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विजयाबद्दल त्यांना पाच लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले. ही स्पर्धा आयआयटी हैदराबाद येथे पार पडली. या विजयी संघात तृतीय वर्षाचे विद्यार्थी अभिषेक निकम, तृप्ती सुकाळे, कोसदा भट आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी हर्षिल बियाणी व अंश दुधे यांचा समावेश होता. पीसीसीओईचे संचालक व प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. अनुराधा ठाकरे आणि सह प्राध्यापक डॉ. सांत्वना गुडधे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 'अॅक्सिलरेटिंग हेल्थ क्लेम्स जर्नी' या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा आयआयटी हैदराबाद, एनआरसीइएस, जनरल इन्शुरन्स कौन्सिल, गुगल, इंडिया इन्सुरटेक असोसिएशन आणि एनएचसीएक्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. देशभरातील नवोन्मेषक, स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून भारताच्या आरोग्यसेवा डिजिटल क्षेत्रात बळकटी देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. पीसीसीओईच्या कॉम्प्युटर एआय एमएल विभागातील विद्यार्थ्यांनी 'प्रोब्लेम सॉल्व्हिंग ३' या विभागात देशभरातील अनेक प्रतिभावान स्टार्टअप्सना मागे टाकत हा विजय मिळवला. त्यांनी 'क्लेमसिंक एआय' नावाचा एक नाविन्यपूर्ण उपाय विकसित केला. हा प्लॅटफॉर्म जटिल आणि असंरचित आरोग्य विमा कागदपत्रांना संरचित, इंटरऑपरेबल डिजिटल डेटामध्ये रूपांतरित करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे आणि प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकणे हा एक समृद्ध अनुभव असल्याचे पीसीसीओईचे संचालक व प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते रामटेकडी परिसरात नवीन पोलिस चौकीचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. नागरिकांच्या मागणीनुसार, बांधकाम व्यावसायिक नाईकनवरे कुटुंबियांच्या वतीने ही चौकी उभारण्यात येत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या चौकीचे उद्घाटन होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमाला हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, झोन पाचच्या पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके, स्थानिक नगरसेविका हेमलता मगर, हेमंत नाईकनवरे, रणजित नाईकनवरे, गौरी नाईकनवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, गेल्या वर्षी पुण्यातील १२ नवीन पोलिस ठाण्यांना राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. राज्यात सर्वाधिक १८०० नवीन पोलिस कर्मचाऱ्यांची भरती पुणे शहरात होत आहे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नवीन पोलिस ठाण्यांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल. अमितेश कुमार यांनी रामटेकडी परिसरातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या तीस हजार नागरिकांच्या सुरक्षेवर भर दिला. त्यांनी अधिकाऱ्यांना या भागाचे मॅपिंग करून अवैध धंदे करणारे आणि १० वर्षांखालील गुन्हेगार यांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले. अशा व्यक्तींना सुधारण्याची संधी द्यावी, मात्र सुधारणा न झाल्यास त्यांची परेड काढण्याच्या कडक सूचनाही त्यांनी दिल्या. ऑक्टोबरमध्ये रामटेकडी भागात घडलेल्या एका घटनेनंतर नागरिकांचे शिष्टमंडळ आपल्याला भेटले होते, असे कुमार यांनी सांगितले. त्यावेळी अवघ्या २४ तासांत कंटेनरमध्ये तात्पुरती पोलिस चौकी सुरू करण्यात आली होती. रामटेकडी परिसरातून गुन्हेगारी हद्दपार करून 'रामराज्य' आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपला प्रभाग ड्रग्ज आणि अवैध धंदेमुक्त करण्यासाठी योजना सुरू करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. आमदार चेतन तुपे यांनी सांगितले की, नवीन तीन मजली पोलिस चौकीमुळे रामटेकडी भागाची सुरक्षा वाढेल. त्यांनी क्रेडाईसारख्या संस्थांनी पुढाकार घेऊन रामटेकडी येथील महापालिकेच्या शाळेचे नूतनीकरण करण्याची गरज व्यक्त केली. नाईकनवरे कुटुंबियांच्या वतीने हेमंत नाईकनवरे यांनी सांगितले की, राज्य सरकारने झोपडपट्टी पुनर्वसनासाठी उत्तम नियमावली तयार केली आहे. या भागात चांगले रुग्णालय उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच, परिसरातील नागरिकांसाठी मल्टिप्लेक्स, फिरण्यासाठी उत्तम सुविधा आणि मुलांसाठी मोफत क्लासेस व चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यावरही ते विचार करत आहेत.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या जागतिक तणावाचा परिणाम भारताच्या इंधन पुरवठ्यावर होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यातच देशात पुन्हा 'लॉकडाऊन' लागणार असल्याच्या अफवांनी नागरिक धास्तावले असून पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत सर्व संभ्रम दूर केला आहे. देशात किंवा राज्यात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही; अशा खोट्या बातम्या पसरवणे हे देशद्रोहासारखेच आहे, अशा कडक शब्दांत त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांना फटकारले आहे. तसेच अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करू, असा सूचक इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचे पडसाद भारतीय बाजारपेठेत उमटत आहेत. एलपीजी सिलेंडर मिळण्यास होणारा विलंब यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पसरत आहेत. यावर मुख्यमंत्री म्हणाले, देशात आणि राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, एलपीजी गॅस आणि पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा आहे. आपल्या देशाच्या डिप्लोमॅटिक रिलेशनशीपमुळे, पंतप्रधानांच्या नीतीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होणार नाही, त्याची काळजी घेतली जात आहे. अशा अफवा पसरवून जर कुणी गोंधळाची स्थिती निर्माण करत असेल तर ते देशविरोधी काम आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. एलपीजी टंचाईवर 'पीएनजी'चा उतारा मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भविष्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा भासू नये, यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. राज्यात गॅस सिलिंडरची टंचाई जाणवू नये म्हणून सगळीकडे पीएनजी कनेक्शन घेण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. पाईप गॅस लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याबाबतचा एक शासन निर्णय काढण्यात आला आहे. सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी अटी-शर्ती शिथील केलेल्या आहेत. या गॅस पाईप लान टाकल्या तर एलपीजीची गरज भासणार नाही. आपल्या देशावर कोणताही नकारात्मक परिणाम नाही देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजूबाजूच्या देशात लॉकडाऊन सुरू असताना आपल्या देशात मात्र त्यावर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी त्याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर पडू दिला नाही. एलपीजी गॅसचाही कुठेही तुटवडा नाही. देशात जर कुणी अफवा पसरवून गोंधळाची स्थिती निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अफवांना बळी न पडण्याचे नागरिकांना आवाहन जागतिक घडामोडींमुळे इंधनाच्या किमतींवर किंवा पुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो, मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. नागरिकांनी कोणत्याही अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये किंवा घाबरून जाऊन साठा करू नये. प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतलयं
बारामती : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातामध्ये दुर्देवी निधन झाले. आज त्यांच्या निधनाला दोन महिने पूर्ण होत आहेत. त्या निमित्त त्यांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट केली आहे. त्या म्हणाल्या, ‘आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले […] The post मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतलयं appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भोंदू खरातसोबत मुख्यमंत्र्यांचेही फोटो; असिम सरोदेंची टीका
मुंबई : प्रतिनिधी विधिज्ञ असिम सरोदे यांनी भोंदू अशोक खरातसोबत फोटो असल्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राला मूर्ख समजत आहेत का? तुम्ही अंधश्रद्धा बाळगणारे आहात, तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा. खरात प्रकरणात स्वत:चा बचाव करत इतरांवर कारवाईचे आदेश देत आहात. खरातसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो आहेत यावर मुख्यमंत्री काय बोलणार […] The post भोंदू खरातसोबत मुख्यमंत्र्यांचेही फोटो; असिम सरोदेंची टीका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘वैयक्तिक’ कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ २ ओळींच्या राजीनाम्यावर उतरला
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे तथा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरातशी कथित संबंध असल्याच्या मुद्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धारेवर धरले आहे. रुपाली चाकणकर यांनी भोंदू अशोक खरातशी असलेल्या कथित संबंधांवरून शुक्रवारी रात्री राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यामुळे […] The post ‘वैयक्तिक’ कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ २ ओळींच्या राजीनाम्यावर उतरला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरातून समोर आलेल्या स्वयंघोषित 'कॅप्टन' अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या प्रकरणावर आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावर अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान आहे, असे म्हणत मुनगंटीवार यांनी अशा भोंदू बाबांविरोधात एक दिवसासाठी कायदा बदलून त्यांना 'सुया टोचून टोचून मारण्याची' शिक्षा दिली पाहिजे, असे विधान केले आहे. स्वतःला अंकशास्त्र आणि कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ म्हणवून घेणारा अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर सिन्नरच्या मिरगाव येथे 'श्री ईशान्येश्वर मंदिर' संस्थानच्या आडून आपले काळे साम्राज्य चालवत होता. एका ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, सध्या हा तपास अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. नेमके काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार? सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित करत, अशा नराधमांना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, मी कायद्यावर विश्वास ठेवणारा एक सुजाण नागरिक आहे, पण जेव्हा टीव्हीच्या माध्यमातून मी अशोक खरातचे अघोरी कारनामे पाहतो आणि ऐकतो, तेव्हा माझ्यासारख्या माणसाच्याही मनात येते की याला कायद्याची कोणतीही सवलत मिळू नये. 'नो कोर्ट, नो कचेरी'; याला फक्त भर चौकात सुया टोचून फासावर लटकवले पाहिजे. मुनगंटीवारांनी व्यक्त केली खंत २१ व्या शतकात आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराजांच्या विचारांचे शिक्षण शाळांमधून देतो. मात्र, अशा प्रकारचे भोंदू बाबा समाजाला तर त्रास देतातच, पण हिंदू धर्मालाही बदनाम करण्याचे काम करत आहेत, अशी खंत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. इतर भोंदू बाबांना इशारा गेला पाहिजे मुनगंटीवार म्हणाले, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, जिथे स्त्रीला देवाच्या बाजूचे स्थान दिले जाते. मात्र, या भोंदू बाबाने स्त्रियांचा अवमान करून प्रत्यक्ष देवाचा आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी देशातील सर्व भोंदू बाबांना निरोप गेला पाहिजे की—'याद रखो तुम्हारी मौत पक्की है! नेमके प्रकरण काय? स्वतःला 'कॅप्टन' म्हणवून घेणारा अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्याचा बनाव करून नाशिक आणि सिन्नर परिसरात वावरत होता. त्याने सिन्नरच्या मिरगाव येथे ‘श्री ईशान्येश्वर मंदिर’ नावाने एक मोठे संस्थान उभारले होते. अंकशास्त्र आणि कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ असल्याचे भासवून तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. एका ३५ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, खरातने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला, त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. एसआयटी तपासात धक्कादायक खुलासे आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा मुळापासून तपास करत आहे. आतापर्यंतच्या तपासात खरातच्या संदर्भात अत्यंत संतापजनक माहिती समोर आली आहे. पोलिसांना खरातच्या डिजिटल उपकरणांमधून तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत, ज्यामध्ये अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे पुरावे आहेत. भोंदू खरातकडे २०० कोटींची संपत्ती? अशोक खरातची नाशिक, सिन्नर आणि शिर्डी परिसरात सुमारे २०० कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता असण्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच त्याच्या फार्महाऊसवर टाकलेल्या छाप्यात पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मोठी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या १५० दिवस कार्यक्रमात उत्कृष्ठ कामगिरी केल्या बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना शनिवारी ता. २८ मुंबई येथे विशेष कार्यक्रमास सेवाकर्मी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने १५० दिवसांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यानुसार मुख्यकार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, केशव गड्डापोड, विजय बोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, समाज कल्याण अधिकारी गीता गुट्टे, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रियंका राजपूत, शिक्षणाधिकारी आसावरी काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मदतीने विविध उपक्रम राबविले. यामध्ये सर्वप्रथम जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कार्यालय मध्ये ई ऑफिस प्रणाली राबविण्यात आली. याशिवाय मागील अनेक दिवसापासून रखडलेल्या पदोन्नत्या मार्गी लावल्या. कार्यालयीन कामकाजामध्ये शिस्त यावी यासाठी बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यात आली. याशिवाय प्रलंबित कामांचा निपटारा, कागदपत्रांचे अ, ब, क, ड वर्गीकरण, कर्मचाऱ्यांची कर्मयोगी पोर्टलवर नोंदणी करून प्रत्येकी पाच अभ्यासक्रम पूर्ण केले. कार्यालयातील कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या शिवाय जिल्हा परिषदेतील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा देखील उगारला. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मूल्यमापनामध्ये हिंगोली जिल्हा परिषदेला शंभर पैकी ८० गुण मिळाले आहेत. या गुणांच्या आधारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना सेवाकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आज मुंबई येेथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यकार्यकारी अधिकारी गायकवाड यांना उत्कृष्ठ सेवाकर्मी पुरस्कार देण्यात आला. यावेळी मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
खरातकडे जाणारे ‘ते’ ४० आमदार कोण?
मुंबई : प्रतिनिधी नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचा संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणामुळे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी मोठी मागणी करत काही सवाल उपस्थित केले आहेत. नाशिकमधील भोंदू अशोक खरातला विमानांची सोय करून देणारे सरकारमधील ‘ते’ बडे नेते कोण? असा […] The post खरातकडे जाणारे ‘ते’ ४० आमदार कोण? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात गॅस, पेट्रोलसाठी रांगाच रांगा
मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू झालले एलपीजी गॅस, पेट्रोलचे संकट काही संपता संपण्याचे नाव घेत नाही. राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर (२८ मार्च) आज रोजीही भल्या मोठ्या रांगा दिसल्या. मुंबई, पुण्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये तर दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. तर काही ठिकाणी तर थेट मारामा-या होतानाही दिसत आहेत. जालन्यातील पेट्रोल पंपावर एका टोळक्याने […] The post राज्यात गॅस, पेट्रोलसाठी रांगाच रांगा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नेपाळचे माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना अटक
काठमांडू : वृत्तसंस्था नेपाळचे माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना अटक करण्यात आली आहे. बालेन शाह यांनी पंतप्रधान होताच मोठी कारवाई केली आहे. शाह यांनी सत्ता स्थापन करताच विरोधकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान बालेन शाह यांनी कॅबिनेट बैठकीत माजी पंतप्रधान ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. […] The post नेपाळचे माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज 2 महिने पूर्ण झाले. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना आज त्यांची आठवण दाटून आली. त्यांनी आपल्या भावना एका पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत. आज तुम्हाला जाऊन 2 महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. अजित पवारांच्या खासगी विमानाने त्या दिवशी सकाळी पावणे 9 च्या सुमारास बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला. त्यानंतर वैमानिकाने दुसऱ्या प्रयत्नांत पुन्हा विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी विमान धावपट्टीपासून काही अंतरावर खोल खड्ड्यात कोसळले. त्यात अजित पवारासंह 5 जण ठार झाले. या दुर्घटनेला आज 2 महिने पूर्ण झाले. पण या दुर्घटनेचा तपास व त्यावरील राजकारण अद्याप संपले नाही. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. खाली वाचा सुनेत्रा पवारांची पोस्ट जशीस तशी सुनेत्रा पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, दादा, आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते आणि त्याचवेळी दैनंदिन राजकीय व सामाजिक कामकाजात तुमचे अस्तित्वही जाणवत राहते.तुमच्यातील लोकाभिमुख - विकासाभिमुख व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ, कामासाठीची झपाटलेली वृत्ती आणि प्रत्येक निर्णयामागची दूरदृष्टी हे सगळेच मला कायम मार्गदर्शन करण्याचे काम करतील. तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होता. तुमच्यामुळे अनेकांना दिशा मिळाली, संधी मिळाली आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळाली. शिव - शाहू - फुले - आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची वाटचाल तुमच्या प्रेरणेनेच अखंड सुरू आहे. लोककल्याणासाठी निर्णय घेताना या परिस्थितीत तुम्ही काय केले असते, हा विचार मनात ठेवून मी प्रत्येक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करते. सुनेत्रा पुढे म्हणतात, तुमच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, ही जाणीव मनाला कायम टोचत राहते. पण तुम्ही दिलेली शिकवण, तुमचे विचार आणि तुमचा वारसा हेच आता पुढचा मार्ग उजळवणारे दीप आहेत. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक आठवण मनात कायमची कोरलेली आहे. तुमच्या शब्दांमधील ताकद मला उभे राहण्याची ऊर्जा देते. दादा, तुमची उणीव शब्दांत मांडणे अशक्य आहे. पण तुमची स्वप्ने, तुमचे कार्य आणि तुमचे विचार पुढे नेण्याचा निर्धार मी कायम मनाशी जपेन. तुम्ही दाखवलेली दिशा आणि दिलेली मूल्ये हीच आमची प्रेरणा आणि मार्गदर्शक राहतील. भावपूर्ण आदरांजली, असे त्या म्हणाल्यात. सुप्रिया सुळे, रोहित पवार, तटकरेही भावूक दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सु्प्रिया सुळे, आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनीही या प्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि आपणा सर्वांचे लाडके अजितदादा यांना आपल्यातून जाऊन दोन महिने झाले. दादा जणू अजूनही आपल्या अवतीभवती आहेत असंच वाटतं. We miss you, Dada, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तर रोहित पवारांनी आठवणींचे 2 महिने, ये प्यार और संघर्ष आखिर तक चलता रहेगा, असे नमूद करत या दुर्घटनेच्या चौकशीसाठी आपला सुरू असलेला संघर्ष असाच सुरू राहील असा निर्धार व्यक्त केला आहे. सुनील तटकरे यांनी अजितदादांच्या विना दोन महिने अकल्पनीय, ही पोकळी कधीच भरून निघणार नाही, असे नमूद करत त्यांच्या आठवणींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. अमोल मिटकरींची खास कविता आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणी एका कवितेवाटे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. खालील फोटोत वाचा त्यांची कविता...
बाजारात तेजीला विराम; ९ लाख कोटींचे नुकसान
मुंबई : जागतिक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याने शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सलग दोन दिवसांच्या तेजीला विराम देत प्रमुख निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक कोसळले. यामुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात ८.९१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सेन्सेक्स १,६९०.२३ अंकांनी घसरून ७३,५८३.२२ वर बंद झाला. निफ्टीही ४८६.८५ अंकांनी घसरून २२,८१९.६० वर स्थिरावला. अमेरिका-इराण तणावामुळे […] The post बाजारात तेजीला विराम; ९ लाख कोटींचे नुकसान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : वृत्तसंस्था इराण-अमेरिका युद्धामुळे केवळ पेट्रोल-डिझेलच नाही, तर आता तुमच्या स्वयंपाकघरातील प्लास्टिकचे डबे, बादल्या आणि अगदी औषधांच्या किमतीही कडाडणार आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे कच्च्या मालाच्या (पॉलिमर) किमतीत मोठी वाढ झाली आहे. भारतातील कंपनी कडउछ ने २५ मार्च रोजी प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ केल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. […] The post आता प्लास्टिकही महागले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रशिया १ एप्रिलपासून पेट्रोल निर्यात थांबविणार
मॉस्को : वृत्तसंस्था रशिया-युक्रेन युद्धाच्या चौथ्या वर्षी आणि मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशांतर्गत इंधन पुरवठा सुरक्षित करण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. रशियाने १ एप्रिल २०२६ पासून पेट्रोलच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत किमती स्थिर ठेवणे आणि पुरवठा सुरळीत ठेवणे हे यामागचे मुख्य कारण असल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियामध्ये […] The post रशिया १ एप्रिलपासून पेट्रोल निर्यात थांबविणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागेल
तेहरान : वृत्तसंस्था मध्यपूर्वेतील युद्धाने आता अत्यंत भीषण आणि निर्णायक वळण घेतले आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील महत्त्वाच्या पोलाद कारखान्यांसह अणू प्रकल्पांवर धडाधड क्षेपणास्त्रे डागत इराणला मोठा दणका दिला आहे. या हल्ल्यांनंतर इराण कमालीचा संतापला असून, या कृत्यासाठी इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागेल आणि याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा थेट इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद […] The post इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील विविध शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कदाचित 3 महिन्यांत एलपीजी गॅस बंद होईल असे पोटात गोळा उठवणारे विधान केले आहे. सध्या पीएनजी गॅस स्वस्त पडत आहे. त्यामुळे त्याचा अधिकाधिक वापर झाला पाहिजे. केंद्राच्या एका पत्रकात 3 महिन्यांनी कदाचित एलपीजी बंद होईल असा उल्लेख आहे. त्यामुळे आपण पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या घेतल्या पाहिजेत, असे ते म्हणालेत. नवी दिल्लीत आज केंद्रीय शहरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर व केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या नेतृत्वात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे, तसेच एका निश्चित कालावधीत पीएनजी सेवांचा विस्तार करण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यानंतर महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री मंत्री छगन भुजबळ यांनी वरील विधान केले. पीएनजीचा अधिकाधिक वापर करण्यावर भर भुजबळ म्हणाले, देशातील निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी गॅसचा पुरवठा सुलभपणे कसा करता येईल? त्यात कोणत्या अडचणी आहेत याचा आढावा घेण्यासाठी आज दिल्लीत सर्व राज्यांच्या सचिवांना आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना बोलावण्यात आले होते. या बैठकीला केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, प्रल्हाद जोशी व मनोहरलाल खट्टर उपस्थित होते. त्यांनी सर्वच राज्याचे मंत्री व सचिवांना काही सूचना केल्या. त्यानुसार, पीएजी गॅस सध्या स्वस्त पडत आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. त्याचा जास्त प्रसार झाला पाहिजे. केंद्र सरकारच्या एका पत्रकात कदाचित 3 महिन्यांनी एलपीजी बंद होईल असा उल्लेख होता. त्यामुळे आपण पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करून घेतल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी यासंदर्भात काम करणे शक्य आहे, तिथे ते सुरू केले पाहिजे. सगळ्या नगरपालिकांनी पीएनजीच्या जोडण्या वाढवल्या पाहिजे. पाण्याचे व वीजेचे कनेक्शन असल्यावरच इमारतींना ओसी दिली जाते. त्याप्रमाणेच आता पीएनजी कनेक्शनच्या सक्तीची अट टाकली पाहिजे. आपल्याला पीएनजी जोडण्या लवकरात लवकर करायच्या आहेत. पाईपलाईन टाकण्यासाठी विविध विभागांना परवानग्या मागितल्या जातात. पीएनजी मिळाली असे समजावे. या परवानग्या 24 तासांत दिल्या जातील. पीएनजी काम करणाऱ्यांना 24 तास परवानगी राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पेट्रोल पंपांवरही मिळणार केरोसीन छगन भुजबळांनी यावेळी गॅस टंचाईमुळे केरोसीनचा अधिकाधिक वापर करण्यावरही भर दिला. ते म्हणाले, राज्य सरकारकडे केरोसिन उपलब्ध होते. पण आपण ते देऊ शकत नव्हतो. कारण, उच्च न्यायालयाने त्यावेळी एक आदेश दिला होता. आता आपण न्यायालयाला कळवले आहे. त्यानुसार, जिथे एलपीजी व पीएनजीचा कमी आहे, तिथे केरोसीनचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. ज्या जुन्या डिलर्सच्या परवान्यांचे नुतनीकरण प्रलंबित होते, त्यांनी ते झाले असे समजून कामाला लागावे. या प्रकरणी पेट्रोल पंपावर केरोसीनचे टँकर उभे करून तेथून पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे भुजबळ म्हणाले.
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी गट या मुद्द्यावरून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांना सहआरोपी करण्याची मागणी केल्यानंतर, अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जोरदार पलटवार केला आहे. आनंद परांजपे म्हणाले की, शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार यांच्या सांगण्यावरणं विकास लवांडे यांनी हा आरोप केला नाही ना? अशी शंका मला येते. त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे होते. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे अनेक फोटो आणि भेटी भोंदू अशोक खरातसोबत झाल्या आहेत. त्यात जयंत पाटील यांना सुद्धा सहआरोपी करावे अशी मंशा रोहित पवारांची आहे का? अशी भावना माझ्या मनात येते. दुसऱ्याचे वाकून बघायची प्रवृत्ती लवांडेंच्या आरोपांना उत्तर देताना आनंद परांजपे यांनी अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या बघायचे वाकून ही त्यांची प्रवृत्ती आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी विधानसभेत आधीच स्पष्ट केले आहे की, खरातला मदत करणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रत्येक व्यक्तीची कठोर चौकशी होईल. मला तर ही शंका येते की आमदार रोहित पवारांच्या सांगण्यावरून त्यांनी हा आरोप केला नाही ना? असा सवालही त्यांनी केला आहे. खरातवर कारवाई झालीच पाहिजे रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी कालच राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचे परांजपे यांनी नमूद केले. भोंदू बाबावर कडक कारवाई झालीच पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. मात्र, राजकीय हेतूने कोणालाही अडकवण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. लवांडेंची मागणी काय? रुपाली चाकणकर यांनी राजीनामा देऊन काही होणार नाही. यांना खरात प्रकरणात सहआरोपी करण गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सुनील तटकरे यांना देखील सहआरोपी करण गरजेचं आहे, अशी मागणी या प्रकरणात शरद पवार गटाचे विकास लवांडे यांनी केली होती.
हिंगोली जिल्ह्याचे झेंडामंत्री म्हणून ओळख निर्माण झालेल्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथीत व्हिडिओ प्रकरणामुळे हिंगोलीचे नाव धुळीला मिळाले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून ‘आर्थिक हिताची’ कामे करणाऱ्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा शासनाने राजीनामा घ्यावा अशी मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी सांगितले की, हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून झिरवाळ यांची निवड झाल्यानंतर त्यांनी हिंगोलीच्या पहिल्याच दौऱ्यात हिंगोली गरिब जिल्हा असल्याचे सांगत जिल्हावासीयांच्या जखमेवर मिठ चोळले. पहिल्याच भेटीतून ते जिल्हयात काय विकास करणार हे स्पष्ट झाले होते. हिंगोलीत ध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थिती लावणाऱ्या पालकमंत्री झिरवळांनी हिंगोली जिल्ह्यात कधीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला नाही. हिंगोली जिल्हयात मागील दोन ते तीन वर्षापासून शेतकरी अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतरही पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी दिल्या नाहीत. हिंगोली जिल्हयातील शेतकऱ्यांच्या पिकविम्याच्या प्रश्नावर त्यांनी काधीही विमा कंपनीला धारेवर धरले नाही. विमा कंपनीने केवळ 25 टक्के अग्रीम रक्कम दिल्यानंतर पुढील रक्कम शेतकऱ्यांना दिलीच नाही. त्याकडेही पालकमंत्री झिरवाळ यांनी लक्ष दिले नाही. हिंगोली जिल्हयाच्या नियोजन समितीच्या बैठका घेतांना ऑनलाईन बैठका घेतल्या. यामध्ये शेतकऱ्यांना वेळेवर रोहित्र मिळत आहे किंवा नाही याची साधी विचारणाही त्यांनी केली नाही. आजही रोहित्रासाठी शेतकऱ्यांना विज कंपनीच्या चकरा माराव्या लागत आहेत. एकीकडे लिगो प्रकल्पामुळे हिंगोलीचे नाव अंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले असून दुसरीकडे पालकमंत्री झिरवाळांच्या कथीत व्हिडिओने हिंगोलीचे नाव मात्र पार धुळीला मिळाले आहे. त्यामुळे केवळ आर्थिक हिताची कामे जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेली कामे रद्द करावीत तसेच पालकमंत्री झिरवाळ यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी दिला आहे.
कळमनुरीत वाळू माफियांना दणका:पिंपरी शिवारात कयाधू नदीत 4 बोटींची होळी, 11 हायवा अन् 4 जेसीबी जप्त
कळमनुरी तालुक्यातील पिंपरी शिवारामध्ये कयादू नदीच्या पात्रातून बोटीद्वारे होणारा वाळू उपसा थांबवून महसूल विभागाच्या पथकाने चार बोट जाळून नष्ट केल्या आहे. तसेच आकरा हायवा व चार जेसीबी असा सुमारे साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महसूल पथकाच्या या कामगिरीने बोटीद्वारे वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे हिंगोली जिल्ह्यांमध्ये कयाधू, पूर्णा या नदीवरील काही वाळू घाटांचा लिलाव झाला आहे. मात्र या लिलावानंतर वाळू उपसा करताना चक्क बोटीचा वापर केला जात असल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे बोटीद्वारे वाळू उपसा करू नये असे स्पष्ट करण्यात आले असतानाही त्याकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. याप्रकरणी तहसील प्रशासनाकडे तक्रारीही केल्या जात होत्या. दरम्यान या तक्रारीनंतर सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुमार मीना, मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे, आनंद काकडे, प्रेम चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी साईनाथ वानखेडे, महेश गळाकाटू, प्रसन्न देशमुख, विशाल पतंगे, एकनाथ कदम, महसूल सेवक संतोष मुधोळ आकाश पुलाते चंद्रकांत पाटे यांच्या पथकाने शुक्रवारी तारीख 27 पिंपरी बुद्रुक परिसरात भेट देऊन पाहणी केली. या पथकाच्या पाहणीमध्ये बोटीद्वारे वाळूचा उपसा होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे या पथकाने चार बोट जप्त करून जाळून नष्ट केल्या आहे. याशिवाय पथकाने याच भागातून वाळू वाहतूक करणारे सुमारे आकरा हायवा चार जेसीबी असा साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जेसीबी व हायवा ट्रक आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. दरम्यान महसूल विभागाच्या या कारवाईमुळे बोटीद्वारे वाळू उपसा करणाऱ्या कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणात महसूल विभागाकडून काय कारवाई केली जाणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे
अंगात दैवी शक्तीचा संचार असल्याचा दावा करत एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या भोंदू ऋषीकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी पिंपरी येथून अटक केली आहे. एका 35 वर्षीय पीडित महिलेने या भोंदू बाबा विरोधात फिर्याद दाखल केली होती. त्याने ‘मी तुझा शंकर, तू माझी पार्वती’ म्हणत महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित महिला मूळची पुण्यातील आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये तिची समाज माध्यमातून वसई येथील ऋषीकेश वैद्य याच्याशी ओळख झाली होती. पीडित महिला व्रतवैकल्ये करत असल्याने, वैद्यने तिला आपल्या जाळ्यात ओढले. 'माझ्या अंगात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची, याचे तंत्र मी तुला शिकवतो,' असे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, 2023 मध्ये आरोपी पुण्यात आला. त्याने मांजरी परिसरात पीडित महिलेची भेट घेतली. तिथे त्याने महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तिला पुन्हा वसई येथे बोलावून तिथेही तिच्यावर अत्याचार केल्याचे महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद आहे. वसईत गुन्हा दाखल, नंतर मांजरी पोलिस ठाण्यात वर्ग नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यातील या पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. सुरुवातीला तिने वसई येथील माणिकपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर वसई पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी पुण्यातील हडपसर भागातील मांजरी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. ऋषीकेश वैद्य याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 4 पथके नियुक्त केली होती. ही पथके आरोपीचा कसून शोध घेत होती. त्यात आरोपी ऋषीकेश वैद्य पिंपरी परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने त्याला अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली. पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले की, ऋषीकेश वैद्यने आणखी काही महिलांवर अत्याचार केल्याची शक्यता आहे. दैवी शक्तीचा संचार झाल्याची बतावणी करून त्याने महिलेवर अत्याचार केले आहेत. अशा प्रकारची कुणाची तक्रार असल्यास पीडित महिलांनी पुणे पोलिसांकडे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. हे ही वाचा… कोकाटेंचे मंत्रिपद कापण्यासाठी खरातचा तटकरेंना फोन:शरद पवार गटाचा दावा; चाकणकर अन् तटकरेंना सहआरोपी करण्याची मागणी राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्री करू नये म्हणून भोंदू अशोक खरातने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना फोन केला होता, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला होता. या प्रकरणी त्यांनी कोकाटेंना त्यांच्याकडे असलेली माहिती पुढे आणण्याचेही आवाहन केले आहे. प्रस्तुत प्रकरणात सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करून त्यांचे व्यवहार तपासले पाहिजेत. कारण अशोक खरात एकटा नसून, त्याची एक मोठी टीम आहे, असेही शरद पवार गटाने म्हटले आहे. वाचा सविस्तर
विविध टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्याने लैंगिक सुख देण्यास नकार देणाऱ्या एका 37 वर्षीय मोलकरणीची गळा चिरून हत्या केल्याची भयंकर घटना मुंबई लगतच्या ठाणे जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपीला विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, आशिष मेश्राम असे आरोपीचे नाव आहे. तो एक टीव्ही अभिनेता आहे. त्याने काही मालिकांमध्ये कामही केले आहे. ते ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड रस्त्यावरील चंद्रेश अकॉर्ड सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये राहत होता. बुधवारी रात्री मृत मोलकरीण त्याच्याकडे काम करत होती. त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. पण मोलकरणीने त्यास नकार दिला. अखेर संतापलेल्या आरोपीने तिचा गळा, छाती व पोटावर चाकूने सपासप वार केले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पण पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर त्याला आंध्र प्रदेशातून बेड्या ठोकल्या. आरोपी अनेक महिन्यांपासून करत होता छळ पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असताना त्यात काही धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी आशिष मेश्राम मोलकरणीकडे गत अनेक दिवसांपासून लैंगिक सुखाची मागणी करत होता. पण मोलकरणीने त्याची मागणी वारंवार धुडकावून लावली होती. त्यानंतरही आरोपी तिचा छळ करत होता. गंभीर बाब म्हणजे गत जानेवारी महिन्यात आरोपीने मोलकरणीच्या मुलाला फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. तुझ्या आईने माझ्याकडे काम करणे बंद केले किंवा माझ्या मागण्या मान्य केल्या नाही, तर मी तिला ठार मारेन, असे तो म्हणाला होता. महिलेच्या मुलाने केला होता चोप देण्याचा प्रयत्न ही धमकी मिळाल्यानंतर मोलकरणीच्या मुलाने आशिष मेश्रामला गाठून चोप देण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी तो सापडला नाही. अखेर काही दिवसांनी आरोपीच्या मोठ्या भावाने मोलकरणीला आश्वासन दिले की, आरोपी आशिष आता त्या फ्लॅटमध्ये राहत नाही. या आश्वासनानंतर मृत महिलेने पुन्हा त्या फ्लॅटवर काम करण्यास सुरुवात केली. पण बुधवारी रात्री ललिता कामावर आल्याचे पाहून आरोपी पुन्हा त्या फ्लॅटवर आला. त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. पण यावेळी तिने नकार दिल्यामुळे अखेर त्याने तिची निर्घृण हत्या केली. कष्टाळू महिलेची हत्या झाल्याने संताप मृत महिला काशिमीरा भागात आपल्या पती व 4 मुलांसह राहत होती. तिचे पती चर्मकार आहेत. ती स्वतः 8-9 घरांमध्ये काम करून आपल्या संसाराला हातभार लावत होती. गत 3 वर्षांपासून मृत महिला मेश्रामकडे काम करत होती. एका कष्टाळू महिलेची अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मीरा रोड पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, सध्या त्या ट्रान्झिट रिमांडवर शहरात आणण्यात येत आहे.
नाशिकचा विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. सुरुवातीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची ठामपणे पाठराखण करणारे राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांचा सूर आता पूर्णपणे बदलला आहे. अशोक खरात हा भोंदू असून त्याला ठोकून काढले पाहिजे, अशा कडक शब्दांत भरणे यांनी आता आपली भूमिका मांडली आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आले, तेव्हा दत्तात्रय भरणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने कोणाची तरी भेट झाली किंवा फोटो काढला, तर त्यात चाकणकरांची काय चूक? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आपण कोणाला तरी गुरू मानतो, यात काहीही गैर नाही, असे म्हणत त्यांनी चाकणकरांचा बचाव केला होता. तेव्हा खरातबद्दल माहिती नव्हती मात्र, आता या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता भरणे यांनी आपली भूमिका बदलली आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जेव्हा मी आधी बोललो होतो, तेव्हा मला अशोक खरात याच्याबद्दल सविस्तर माहिती नव्हती. हे प्रकरण नेमके काय आहे, याची कल्पना नव्हती. पण आता सत्य समोर आल्यावर समजले की तो एक भोंदूबाबा आहे. अशा लोकांना वेगळ्या प्रकारे अद्दल घडवली पाहिजे. अशांमुळे सर्वांची बदनामी होते दत्तात्रय भरणे म्हणाले की, महाराष्ट्रात चांगले महाराजही आहेत, पण अशा एक-दोन लोकांमुळे सर्वांची बदनामी होते. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, अशी कबुलीही त्यांनी दिली. खरात हा अत्यंत चुकीचा माणूस असून मी त्याची पाठराखण कधीच करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रशियन ऑईल टर्मिनल्सवर भीषण हल्ला; युक्रेनचा पुतिन यांना मोठा दणका!
मॉस्को : वृत्तसंस्था गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाने आता भीषण रूप धारण केले आहे. युक्रेनने बुधवारी रशियाच्या बाल्टिक समुद्रातील ‘प्रिमोर्स्क’ आणि ’उस्त-लुगा; या दोन अत्यंत महत्त्वाच्या तेल निर्यात बंदरांवर ड्रोनचा मोठा हल्ला केला. या हल्ल्यामुळे बंदरातील तेल साठ्यांनी पेट घेतला असून, आगीचे भीषण लोट शेजारील देश फिनलंडमधूनही स्पष्टपणे दिसत आहेत. या हल्ल्यानंतर रशियाने […] The post रशियन ऑईल टर्मिनल्सवर भीषण हल्ला; युक्रेनचा पुतिन यांना मोठा दणका! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ई-केवायसी पूर्ण न केल्यास कर्मचा-यांचे वेतन रोखणार; प्रक्रिया बंधनकारक
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सेवार्थ प्रणालीमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांची सविस्तर माहिती नोंदवलेली आहे. या माहितीच्या आधारेच वेतन अदा केले जाते. मात्र, काही प्रकरणांमध्ये एकाच कर्मचा-याची दुबार नोंद होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व कर्मचा-यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार, एप्रिल २०२६ ते मे २०२६ या कालावधीतील वेतन मिळवण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी […] The post ई-केवायसी पूर्ण न केल्यास कर्मचा-यांचे वेतन रोखणार; प्रक्रिया बंधनकारक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वर्दीचं स्वप्न अपूर्णच!:पुणे पोलिस भरतीत 1600 मीटर धावताना बुलढाण्याच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा मैदानी चाचणी दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिवाजीनगर मैदानावर शनिवारी (दि. 28) सकाळी घडली. सोळाशे मीटर धावण्याची चाचणी देत असताना तिसऱ्या फेरीत त्याला अचानक 'फिट' आली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पुरुषोत्तम बारकुल (23, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे शहर पोलिसांच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. शनिवारी सकाळी पुरुषोत्तम याची मैदानी चाचणी सुरू होती. पोलिस भरतीतील अत्यंत कठीण टप्पा मानल्या जाणाऱ्या 1600 मीटर धावण्याच्या चाचणीत तो सहभागी झाला होता. दोन फेऱ्या पूर्ण केल्यानंतर, तिसऱ्या फेरीदरम्यान पुरुषोत्तमला अचानक 'फिट' (झटका) आली आणि तो धावता धावता मैदानावरच कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मैदानावरील इतर उमेदवार आणि पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली. पुरुषोत्तम कोसळल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली. त्यावेळी त्याचे हृदयाचे ठोके अत्यंत मंदावले असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून ससून सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. अचानक तरुणाचा भरती दरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. पुरुषोत्तमच्या निधनामुळे बुलढाणा जिल्ह्यातील त्याच्या गावावर शोककळा पसरली असून, पोलिस दलातही या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठा अद्याप सुरळित झालेला नसतानाच जिल्हा प्रशासनाने डिझेलवर निर्बंध आणले. डब्यातून डिझेल विक्रीवर बंदी घातल्याने उद्योगातील जनसेट बंद आहेत. त्याचा मोठा परिणाम उत्पादनावर झाला आणि सुमारे 5 हजार कामगार घरी बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उद्योगांत विद्युतपुरवठा खंडित झाल्यानंतर विजेला पर्याय म्हणून जनसेट चालवतात. त्याला मोठ्या प्रमाणात डिझेल लागते. तेच मिळत नसल्याने 8 उद्योगातील उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याचे उद्योग जगतातून सांगण्यात आले. एमआयडीसीमधील मोठ्या यंत्रसामग्रीला अखंडित वीज लागते. महावितरणचा पुरवठा खंडित झाल्यास लाखो रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी तत्काळ ‘पॉवर जनरेटर’ सुरू करावे लागते. त्यासाठी बॅरल किंवा कॅनमधून पंपावरून डिझेल आणले जाते. प्रशासनाने सुट्या इंधन विक्रीवर बंदी घातल्याने पंपचालक उद्योजकांना डिझेल देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. पुरवठा विभागाकडे एमआयडीसीतील अनेक उद्योजकांनी बॅरलमधून डिझेल देण्याची मागणी केली आहे. सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनला पत्र दिले. कठीण काळात महावितरणने काळजी घ्यावी कठीण काळात उद्योगांना मदत करायची असेल तर महावितरणकडून विनाअडथळा विद्युत पुरवठा सुरू ठेवावा लागणार आहे. महावितरणचे सतत अडथळे असतात. खरंच सरकारला सगळ्यांना मदत करायची असेल तर त्यांनी महावितरणचा वीजपुरवठा विनाअडथळा सगळ्यांना सुरळित ठेवला पाहिजे. आता अडचणी खूप वाढल्या. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर फॅक्टरी सुरू ठेवण्यासाठी डिझेलवरील जनसेट सुरू करावे लागतात. शरदकृष्ण ठाकरे, अध्यक्ष, लक्ष्मी हायड्रोलिक्स या उद्योगांना फटका लिनित एक्सपोर्टस्, कॉनकंट्रीझ मेटल स्ट्रॅटेझिज प्रायव्हेट लिमिटेड, लक्ष्मी हायड्रोलिक प्रायव्हेट लिमिटेड, श्रीकृष्ण फार्मासिटीकल्स अर्निकेम इंडस्ट्रीज, वेस्टर्न अमोनिया इंडस्ट्रीज. औद्योगिक संकट वाढतच जाणार 8 मार्चपासून 10 हजार 800 व्यावसायिक गॅस सिलिंडरचे बुकिंगच बंद करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने आदेश काढून 50 टक्के व्यावसायिक सिलिंडर पुरवण्याची सूचना केली. परंतु त्याच्या मार्गदर्शक सूचना अद्यापही नाहीत. त्यामुळे उत्पादनांना गॅसच नाही. अशा अवस्थेत डिझेलवर निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे औद्योगिक संकट वाढतच जाणार. त्यावर तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. योग्य व्यवस्थापनाच्या सूचना दिल्या आहेत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह अन्य कामांसाठी डिझेलची गरज भासते. उद्योगांसाठी ते गरजेचेच आहे. सध्या काळाबाजार रोखण्यासाठी कॅन किंवा बाटलीतून पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पण, उद्योगांसमोर डिझेलअभावी अडचणी निर्माण होऊ नयेत. यासाठी त्यांची गरज लक्षात घेऊन योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात येतील. उद्योजकांच्या समस्यांची तातडीने दखल घेतली जाईल. जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 140 कोटी जनतेची टीम इंडिया अतिशय सक्षम आहेत. राऊतांनी त्यांची भूमिका काय हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. कारण ते नेहमी पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेत असतात, उबाठाची टीम पाकिस्तान आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. इंधन पुरवठा सुरळीत होण्यासाठी पंतप्रधान काम करत आहेत. नवनाथ बन म्हणाले की, कालपर्यंत गॅस आणि इंधन पुरवठा नाही म्हणणारे संजय राऊत आज इराणमुळे देशात गॅस-इंधन पुरवठा सुरळीत आहे असे म्हणत आहे. काल जेव्हा अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार ही धमकी दिली तेव्हा त्यांचे डोकं ठिकाण्यावर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे सर्व गोष्टी सुरळीत सुरू आहे. भांडणे लावू नका नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी जाती-जातीमध्ये आणि धर्मा-धर्मात वाद लावण्याचे काम करू नये. राज्यातील धार्मिक स्थळांना गॅस पुरवठा करण्याकरता राज्य सरकार प्रयत्न करत आहे. कुठेही धार्मिक भेदभाव करणे महाराष्ट्र सरकारचे काम नाही. नार्वेकरांवर काय कारवाई करणार नवनाथ बन म्हणाले की, रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झालेला आहे. तर खरात प्रकरणी कसून चौकशी करण्याचे काम राज्य सरकारकडून सुरू आहे. कुणालाही सोडले जाणार नाही. मविआने शेतकऱ्यांचे पाणी भोंदूला दिले, तेव्हा मंत्रालयापर्यंत त्याचा वावर कोणी आणला होता. राऊतांच्या दबावामुळेच खरातला पाणी देण्यात आले ही माहिती आमच्याकडे आहे. 40 आमदार खरातकडे जात होते त्यामध्ये मिलींद नार्वेकर होते, त्यांचे फोटो आहेत. नार्वेकरांवर कुठली कारवाई करणार हे स्पष्ट करा. राऊत महाराष्ट्र द्रोही म्हणून काम करता नवनाथ बन म्हणाले की, देवाभाऊंच्या नेतृत्वात टीम महाराष्ट्र अत्यंत सक्षमपणे काम करत आहे. महायुतीच्या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा गाडा अत्यंत व्यवस्थित ठेवण्याचे काम फडणवीस करत आहेत. राऊत 11 कोटी जनता आमच्यासोबत आहे. जनतेने तुम्हाला विरोधी पक्षनेता निवडून यावा इतकेही बहुमत दिलेले नाही. महाराष्ट्र विरोधी भूमिका घेताना जनतेने तुम्हाला बघितले आहे. देवेंद्र फडणवीस यांची टीम महाराष्ट्र ठरले आहे. तुम्ही महाराष्ट्र द्रोही म्हणून काम करत आहात.
५ घरफोड्या करणारा बांगलादेशी आरोपी जेरबंद:पुणे पोलिसांनी विविध राज्यांतील गुन्हे उघडकीस आणले
पुणे पोलिसांनी विविध राज्यांमध्ये ५० हून अधिक घरफोड्या करणाऱ्या एका कुख्यात बांगलादेशी आरोपीला अटक केली आहे. कर्वेनगर परिसरात घडलेल्या एका घरफोडी प्रकरणाचा तपास करत असताना ही कारवाई करण्यात आली. या अटकेमुळे अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. १४ मार्च २०२६ रोजी रात्री ते १५ मार्च २०२६ दरम्यान कर्वेनगरमधील नवसह्याद्री सोसायटीतील एका कार्यालयात घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्याने खिडकीचे गज तोडून प्रवेश करत सोनी कंपनीचा कॅमेरा, दोन लेन्स, मार्विक प्रो 2 ड्रोन, अॅपल कंपनीचा आयफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असा सुमारे ६.७१ लाख रुपयांचा ऐवज चोरला होता. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक संशयित व्यक्ती रॉयल एनफिल्ड हिमालयन बाईकवरून जाताना दिसला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी त्या बाईकचा माग काढला. आरोपी हैदराबाद, नागपूर, जबलपूर, मिर्झापूरमार्गे वाराणसीकडे गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. पुणे पोलिसांनी वाराणसी पोलीस आयुक्तालयाच्या मदतीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने स्वतःचे नाव मोहम्मद बशर नूर मोहम्मद (वय ३८, मूळ रा. ढाका, बांगलादेश) असे सांगितले. तो नेवानाथ विनोद कुमार या नावानेही वावरत असल्याचे समोर आले आहे. आरोपी बनावट ओळखपत्रे तयार करून विविध ठिकाणी गुन्हे करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. आरोपीकडून चोरीस गेलेला सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय, त्याच्याकडून बांगलादेशी पासपोर्ट तसेच विविध देशांची चलनेही मिळाली आहेत. आरोपीविरुद्ध वाराणसी येथे इमिग्रेशन अॅक्ट अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये त्याच्यावर ३६ गुन्हे नोंद आहेत, तर इतर राज्यांतील गुन्ह्यांचीही चौकशी सुरू आहे. ही यशस्वी कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अलंकार पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली.
खरात प्रकरणी आर्थिक गोष्टीचा तपास करण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. चाकणकर यांचा आयोगाचा आणि प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा एकाच वेळी होऊ शकला असता. आयोगाच्या राजीनामा हा मुख्यमंत्र्यांनी द्यायला सांगितला त्यामध्ये काही तटकरेंचा रोल नव्हता. आणि महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा काही राजीनामा नाही ही गच्छंती आहे,असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांनी राजीनामा घेतला आहे, ते पक्षातील नाराजी ओळखत घेतला आहे. चाकणकर यांच्यावर आरोपपत्र दाखल होईल असे वाटते. एसआयटीवर विश्वास ठेवायला हवा. चाकणकर, केसरकरांची चौकशी व्हावी सुषमा अंधारे म्हणाल्या की, भोंदू खरात प्रकरणी पोलिस तपास करतील त्या तपासाकडे आमचे लक्ष राहील. रुपाली चाकणकर, दीपक केसरकर यांची या प्रकरणी का चौकशी व्हावी याबद्दल माहिती आम्ही एसआयटी प्रमुखांना दिली आहे. चाकणकर यांचा राजीनामा ही आमची मागणी नाहीच. त्यांना पदावर असताना अटक झाली तर पक्षाची प्रतिमा डागाळेल. त्यांच्या राजीनाम्यासाठी मी नाही तर त्यांच्या पक्षातीलच लोकं आग्रही होते. 16 वर्षांपासून महिलांचे शोषण सुषमा अंधारे म्हणाल्या की, भोंदू खरातकडून 16 वर्षांपासून महिलांचे शोषण सुरू आहे. यात किती केसेस असतील? हजारो केसेस या प्रकरणी असू शकतात. चाकणकर आणि खरात याचा 12 ते 13 वर्षांपासून संपर्क आहे. खरातला मोठे करणारी लोकं कोण आहेत, तर दीपक केसरकर यांचा मी उल्लेख केला ते शालेय शिक्षणमंत्री? ते एमआयडीसीच्या मैदानावर काय करत होते. आवारे नावाचा माणूस जो जगदंब पतसंस्थेचा प्रमुख आहे त्या पतसंस्थेमध्ये खरातचे आर्थिक व्यवहार असू शकतो त्या आवारेंची चौकशी झाली पाहिजे. खरातसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे.
हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या 64 पदासाठी पात्र ठरलेल्या 411 उमेदवारांची रविवारी ता. 29 लेखी परीक्षा आदर्श महाविद्यालयात घेतली जाणार आहे. यावेळी उमेदवारांनी कुठल्याही प्रकारची स्मार्ट उपकरणे आणू नये, तसेच गैरप्रकाराचा प्रयत्न केल्यास तातडीने कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी दिली आहे. जिल्हा पोलिस दलातील 64 रिक्त पदांसाठी 11 फेब्रुवारी पासून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सदर प्रक्रियेत कागदपत्रे पडताळणी, मैदानी चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी पहाटे चार वाजल्यापासूनच भरती प्रक्रिया सुरु केली होती. त्यामुळे मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मैदानी चाचणी नंतर लेखी परिक्षेसाठी 411 उमेदवार पात्र ठरले आहे. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी ता. 29 सकाळी आकरा ते दुपारी साडेबारा यावेळेत होणार आहे. यासाठी उमेदवारांना सकाळी 9 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे सूचना दिल्या आहेत. उमेदवारांनी प्रवेश पत्रावर दिलेल्या सूचनांचे अवलोकन करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी स्मार्ट डिव्हाईस यामध्ये इलेक्टॅनिक साहित्य, वॉच, हेडफोन, मोबाईल इतर प्रतिबंधीत साहित्या परीक्षा केंद्रावर आणू नये. या ठिकाणी परीक्षा केंद्रावर आलेल्या उमेदवारांची बायोमेट्रीक तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रात सोडले जाणार आहे. आदर्श महाविद्यालयाच्या 10 खोल्यांमध्ये परीक्षा होणार असून प्रत्येक खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या शिवाय प्रत्येक खोलीत लेखी परिक्षेचे छायाचित्रीकरण केले जाणार आहे. या शिवाय चार कर्मचारी पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्येक खोलीमध्ये घड्याळ लावण्यात आले असून त्यामुळे उमेदवारांनी घड्याळ घेऊन येऊ नये. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळून आल्यास उमेदवारावर कारवाई करून परिक्षेसाठी अपात्र केले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी सांगितले.
वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर कारंजा ते वनोजा टोल प्लाझा दरम्यान चॅनल क्रमांक 197 जवळ पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षा आणि आपत्कालीन मदत यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून मुंबईकडे मालवाहतूक करणारा एक ट्रक प्रवास करत असताना अचानक त्याचा डिझेल पाईप तुटला. त्यामुळे संबंधित ट्रक महामार्गाच्या मधोमधच नादुरुस्त अवस्थेत उभा राहिला. या परिस्थितीत ट्रक चालकाने तत्काळ समृद्धी महामार्गावरील मदत यंत्रणा तसेच वाहतूक पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार फोन करूनही कोणतीही मदत वेळेत उपलब्ध झाली नाही, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, नादुरुस्त ट्रक रस्त्याच्या मधोमध उभाच असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. याच दरम्यान पहाटे अंदाजे तीन वाजण्याच्या सुमारास मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने नादुरुस्त ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुसऱ्या ट्रकचा चालक जागीच ठार झाला. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक दीड ते दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे, अपघात घडूनही बराच वेळ कोणतीही मदत घटनास्थळी पोहोचली नाही. अखेर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मदत यंत्रणा आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत अपघातातील मृत व्यक्तीसाठी खूप उशीर झाला होता. या संपूर्ण घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन सेवांची तत्परता, गस्त व्यवस्था तसेच नादुरुस्त वाहनांसाठी तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या यंत्रणेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. महामार्गावर इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक असताना, अशा प्रकारे मदत मिळण्यात झालेला विलंब भविष्यात अधिक मोठ्या दुर्घटनांना कारणीभूत ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्री करू नये म्हणून भोंदू अशोक खरातने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना फोन केला होता, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला होता. या प्रकरणी त्यांनी कोकाटेंना त्यांच्याकडे असलेली माहिती पुढे आणण्याचेही आवाहन केले आहे. प्रस्तुत प्रकरणात सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करून त्यांचे व्यवहार तपासले पाहिजेत. कारण अशोक खरात एकटा नसून, त्याची एक मोठी टीम आहे, असेही शरद पवार गटाने म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता तथा संघटक सचिव विकास लवांडे या प्रकरणी म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. त्याची नवनवीन प्रकरणे बाहेर येत आहेत. हा लिंगपिसाट भोंदू बाबाने गेल्या काही वर्षांत अनेक महिलांचे शोषण केले. अनेक महिलांचे शारीरिक, मानसिक आर्थिक शोषण केले. या प्रकरणात अनेक मोठे राजकीय व्यक्ती व उद्योजक अडकलेत. ही सर्व काळी कृत्य करणे हे त्याचे एकट्याचे काम नाही. त्याच्याभोवती मोठे रॅकेट किंवा मोठी टीम असल्याशिवाय हे शक्य नाही. कारण, आजपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकला नाही. त्याची कुकर्मे बाहेर आली नाही. चाकणकरांनी उपकार केल्यासारखा राजीनामा दिला विकास लवांडे म्हणाले, अशोक खरातच्या टीममध्ये ज्यांनी आता राज्य महिला आयोगाचा व राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्या रुपाली चाकणकरांचा समावेश आहे. त्यांनी उपकार केल्यासारखे राजीनामे दिलेत. त्या त्याच्यात खरोखर आरोपी आहेत. सुनील तटकरे आरोपी आहेत. हे दोघेही नाशिकच्या विमानतळावर उतरून तेथून गाडीने अनेकवेळा खरातकडे गेले आहेत. अनेक लोकांना त्यांच्या माध्यमातून अशोक खरात भेटला आहे. अशोक खरातचे अनेक व्यवहार या दोघांना माहिती आहेत. त्यामुळे या प्रकरणी खरात, तटकरे व चाकणकरांचे गत काही वर्षांतील सर्व सीडीआर तपासण्याची गरज आहे. त्यांचे मेसेज तपासले पाहिजेत. यांचा संपर्क कुठे, कसा, काय होत होता? व्यवहार कोणकोणते होत होते? हे तपासले पाहिजे. कारण, त्या ट्रस्टच्या विश्वस्तांची अद्याप चौकशी झाली नाही. त्यांच्यावर अद्याप गुन्हे दाखल झाले नाही. या ट्रस्टवर रुपाली चाकणकर स्वतः विश्वास्त होत्या. या ट्रस्टचे जे कुणी अकाउंटचे काम पाहणाऱ्या सीएवरही गुन्हा दाखल करून चौकशी झाली पाहिजे. कारण, मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत, असे ते म्हणाले. माणिकराव कोकाटेंचा होता अडथळा विकास लवांडे पुढे म्हणाले, या सर्व प्रकरणात सिन्नरचे आमदार माणिकरावर कोकाटे खरातच्या मार्गात अडथळा ठरत होते. कोकाटे या खरातकडे गेल्याचे कुठेही फोटो नाहीत, कुठेही चर्चा नाही. याच खरातने राज्यात सरकार स्थापन होत असताना सुनील तटकरेंना फोन करून कोकाटेंना मंत्री करू नये म्हणून फोन केला होता. तटकरेंनी सांगावे की किती वेळा खरातने त्यांना विनवण्या केल्या किंवा फोन केले माणिकरावांना मंत्री करू नये म्हणून. रुपाली चाकणकरांनीही तसा आग्रह धरला होता. पण अजित पवारांनी कोकाटेंना मंत्री केले. आज कोकाटेंनी त्यांच्या मतदारसंघात सिन्नरला एवढे मोठे रॅकेट सुरू असताना आता बोलण्याची आवश्यकता आहे. मंत्री कोकाटेंना अनेक गोष्टी माहिती विकास लवांडे म्हणाले, कोकाटेंना या प्रकरणातील अनेक गोष्टी माहिती असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात जोपर्यंत सुनील तटकरे व रुपाली चाकणकरांवर सहआरोपी करून गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत या प्रकरणातील नव्या गोष्टी बाहेर येणार नाहीत. खरे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही खरातसोबत फोटो असल्याचे समोर आले आहे. परवाच एक ऋषिकेश वैद्य नामक आणखी एक भोंदूबाबा सापडला. त्याच्यासोबतही मुख्यमंत्र्यांचे व आरएसएसच्या सर्व लोकांचे फोटो आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकरणात फडणवीस हेच कुणाला आरोपी करायचे व कुणाला करायचे नाही हे ठरवणार आहेत. आता या प्रकरणात मोठमोठे मासे दडपायचे की पुढे आणायचे हे मुख्यमंत्री ठरवणार आहेत. तटकरे व चाकणकरांवर गुन्हे दाखल केल्यानंतर अनेक नवी प्रकरणे पुढे येऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना फ्री हँड द्यावे अशी आमची मागणी आहे, असे लवांडे यांनी म्हटले आहे.
सत्ताधारी आमदार दीपक केसरकर म्हणतात की मला एकट्यालाच का टार्गेट करता आहात, खरातकडे 40 आमदार जात होते, हे 40 आमदार कोण हे पुढे आले पाहिजे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. खरातसाठी विमानांची सोय करणारे सरकारमधील कोण लोकं होते हे जाहीर केले पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, खरात दिल्लीमध्ये जात कोणाला भेटत होत हे जर पोलिस तपासात निष्पन्न झाले असेल तर ते समोर आले पाहिजे. अशोक खरात यांचा वावर सर्वत्र होता. सरकारने त्याला राजमान्यता दिली होती. ज्यांनी त्यांना राजमान्यता दिली ती लोकं फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आजही आहेत, फडणवीसांनी त्यावर बोलावे. एखाद्या समाजाच्या मंदिरासाठी मंत्री जर वेगळी ववस्था करत असतील तर त्यावर आम्ही टीका करणार नाही. नरेंद्र मोदी यांनी जी चूक केली ती देवेंद्र फडणवीयांनी करू नये. त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनासोबत घेत यावर बैठक घ्यावी. विरोधी पक्षनेता नेमावा तरच टीम महाराष्ट्र तयार होईल. .. हे सर्व ढोंग संजय राऊत म्हणाले की, आपले पंतप्रधान कधी राष्ट्रीय विचार करतात का? मुळात त्यांच्या पक्षामधील टीम त्यांच्याकडे नाही. हम दो हमारे दो असे ते वागतात. जे सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिले नाही ते टीम इंडियाम्हणत आहे. हे सर्व ढोंग आहे. ते कधीच विरोधी पक्षाला विश्वासात घेत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच कोणत्या विषयावर चर्चा करत नाही. व्हिडिओची पडताळणी कशी करणार? संजय राऊत म्हणाले की, मंत्री झिरवाळ यांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओची पडताळणी कशी करणार. मुख्यमंत्री किरीट सोमय्यांच्या व्हिडिओची सत्यता तपासणार होते, असे ते बोलले होते. पण ती सत्यता पडताळली पाहिजे. विरोधी पक्षाबद्दल असे काही घडले असते तर सरकारने आधी फाशी मग चौकशी ही भूमिका घेतली असती. इथे फाशीचे नावच नाही, करू चौकशी सुरू आहे. ..तर विरोधकांना विश्वासात घेतले पाहिजे संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान, मुख्यमंत्री जर सांगत असतील लॉकडाऊन लागणार नाही तर ती चांगली गोष्ट आहे, तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीम इंडियामध्ये कोण आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले पाहिजे. का केवळ मोदी आणि अमित शहाच त्यामध्ये आहेत. जर महाराष्ट्रात टीम करायची असेल तर विरोधकांना विश्वासात घेतले पाहिजे. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेता नेमला पाहिजे. इराणमधील जनतेसाठी देशभरातील लोकांनी पैसे जमा करत त्यांना 500 कोटीची मदत केली आहे. सरकारने मदत केलेली नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपने काहीही केले तरीही तिथे ममता बॅनर्जीच जिंकणार असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.
इराण-इस्त्रायल युध्दाची झळ वाहतूक व्यवसायालाही बसली असून अस्थिर वातावरणामुळे भाडेही 20 टक्क्यांनी वाढले आहे. मालवाहतुकीला परराज्यात जातांना जागोजागी डिझेल मिळाले किंवा हॉटेल्स खुले राहतील की नाही याची शाश्वती नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. शहरांतर्गत मालवाहतुकीवर अद्याप परिणाम दिसत नसला तरी शहरातून जाणारा कृषी माल, उद्योगांची उत्पादने, शहरात येणारे धान्य, किराणा यांवर याचा परीणाम झाला आहे. नाशिकमध्येच दररोज किमान 1150 ट्रक, ट्रेलर माल घेऊन येतात आणि तितकेच बाहेरच्या राज्यात माल पोहोचवतात, त्यापैकी 30 टक्के वाहनांना ब्रेक लागला आहे. मालवाहतूक व्यवसायाला देशाच्या धमण्या मानल्या जातात. मात्र गेल्या पाच दिवसांपासून देशभरात इंधनासाठी लागलेल्या रांगांमूळे रस्त्यात डिझेल मिळेलच याची शाश्वती राहिलेली नाही. दुसरी बाब म्हणजे, व्यवसायिक सिलिंडरअभावी अनेक हॉटेल्स बंद पडले आहेत, त्यामुळे जेवण मिळेलच याचीही शाश्वती वाहनचालकांना राहिलेली नाही. अनेक वाहनचालक वाहन रस्त्याच्या कडेला लावून आपला स्वयंपाक बनवतात, त्याकरीता प्रवासात कुठेही घेवून जाता येणारे तीन लिटरचे सिलिंडर वापरले जाते. ते यापूर्वी कुठेही भरून मिळत होते किंवा बदलून मिळत होते. आता तेही मिळणे बंद झाले आहे. या सर्व अनिश्चिततेमुळे वाहनचालक एकतर मालवाहतुकीला जाण्यास तयार नाहीत किंवा जास्तीचे पैसे मागतात. यामुळे मालवाहतुकीचे भाडेही 20 टक्क्यांनी महागले असून किमान 30 टक्के वाहनांना ब्रेक लागला आहे. शहरातून बाहेर जाणारा माल नेण्यासाठी काही प्रमाणात ब्रेक लागला आहे तसेच बाहेरील राज्यातून शहरात येणार मालही मोठ्या प्रमाणात बंद झाला आहे. यामुळे अशीच स्थिती राहिली आणि त्यात आणखी भर पडल्यास व्यवसायाला दुहेरी फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे व्यापार व उद्योग जगतातून चिंता व्यक्त होत आहे. बाहेरून गहू, तांदूळ येण्यासाठी अडचण सध्या गव्हाचा हंगाम असून मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आपल्या शहरात गहु येत असतो तर झारखंड, छत्तीसगड येथून तांदूळ येतो. मात्र, ऐन हंगामात 60 टक्के वाहने येणे बंद झाले आहे. त्यातच 31 मार्चपर्यंत मध्य प्रदेशात बाजार समित्या बंद आहेत, याचा दुहेरी फटका धान्य व किराणा व्यवसायाला बसतो आहे. - राहुल डागा, धान्य, किराणा घाऊक व्यापारी ...तर पूर्ण व्यवस्थाच कोलमडेल सिलिंडरअभावी अनेक हॉटेल्स बंद आहेत, इंधनाची शाश्वती नाही, त्यामुळे वाहतूकदार असुरक्षित झाला आहे. दोन दिवसांपूर्वी घेतलेला भाड्याचा दर आज 20 टक्के वाढला आहे. किमान 30 टक्के मालवाहतूक ठप्प आहे. शहरांतर्गत परिणाम नसला तरी दहा दिवसात हे सगळे नियमित झाले नाही तर पुर्ण व्यवस्था कोलमडेल.-राजेंद्र फड, अध्यक्ष, नाशिक डिस्ट्रीक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन
युद्धामुळे पामतेल, सूर्यफुलात 10 रुपयांनी वाढ:दररोज लागणाऱ्या 100 टनांपैकी केवळ 70 टनच पुरवठा
आखाती देशांतील युद्धाचा परिणाम आता छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेवर दिसू लागला आहे. यातील एक म्हणजे खाद्यतेलाच्या आयात आणि पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांत सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांची वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे वाढलेले भाव आणि जहाजांचा वाढलेला वाहतूक खर्च यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. शहराला दररोज सुमारे 100 टन खाद्यतेलाची गरज भासते. मात्र, सध्या युद्धामुळे आयात मंदावल्याने केवळ 70 टनच पुरवठा होत आहे. टंचाई वाढणार रशिया-युक्रेनमधून सूर्यफूल येते, मलेशियातून पामतेल तर अर्जेंटिना-ब्राझीलमधून सोयाबीन तेल आयात होते. मात्र सध्या युद्धामुळे खर्च वाढला आहे. -राकेश पांडे, विक्रेते. करडीचे भाव कमी झाले करडीचे नवीन पीक बाजारात आले आहे. त्यामुळे करडी तेलाचे भाव 20 रुपयांनी कमी झाले आहेत.- जगन्नाथ बसैये, विक्रेते. पंधरा दिवसांत असे बदलले भाव (प्रतिलिटर) खाद्यतेल 15 दिवसांपूर्वी आताचे भावसूर्यफूल 160 रुपये 175 - 180 रुपयेसोयाबीन 140 रुपये 150 रुपयेपामतेल 110 रुपये 120 - 140 रुपयेसरकी रिफाइंड 140 रुपये 150 रुपयेशेंगदाणे 195 रुपये 200 रुपयेकरडी 320 रुपये 300 रुपये करडी तेलाच्या दरात 20 रुपयांची घसरण स्थानिक पातळीवर मात्र ग्राहकांना दिलासा देणारी बाब समोर आली आहे. करडीचे नवीन पीक बाजारपेठेत दाखल झाल्यामुळे करडी तेलाच्या दरात 20 रुपयांची घट झाली आहे. सध्या 300 रुपये लिटरने मिळणारे हे तेल आगामी काळात 250 रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे तथा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरातशी कथित संबंध असल्याच्या मुद्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. कर्माची फळे चुकत नसतात. ती ह्याच जन्मात भोगावी लागतात. 'वैयक्तिक' कारणांपासून सुरू झालेला 'माज' 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला, असे त्यांनी म्हटले आहे. रुपाली चाकणकर यांनी भोंदू अशोक खरातशी असलेल्या कथित संबंधांवरून शुक्रवारी रात्री राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यामुळे त्यांच्यावरील टीकेची धार कमी होण्याची शक्यता होती. पण उलट विरोधकांनी त्यांच्यावरील टीकेची धार अधिकच तिखट केली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. 'वैयक्तिक' कारणांपासून सूरू झालेला 'माज' 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला, असे त्यांनी म्हटले आहे. दादांच्या कार्यकर्त्या बहिणी समाधानी झाल्या - रुपाली ठोंबरे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही या प्रकरणी चाकणकरांवर निशाणा साधला आहे. चाकणकरांनी राजीनामा दिला नाही घेतला गेला आहे. भोंदूबाबा खरात बलात्कार प्रकरणात त्या आरोपी असल्याने सगळी चौकशी होणार. SIT ला मर्यादा होत्या आता त्या संपल्या. धन्यवाद सुनेत्रा वहिनी. ज्या सर्व लोकांनी ह्या पदाचा दुरुपयोग केला ते सर्व आरोपी आहेत. आज अजितदादांच्या कार्यकर्त्या बहिणी समाधानी झाल्या आहेत, असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. अंजली दमानियांनीही साधला निशाणा दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणी रुपाली चाकणकर यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या, एक ओळीचा राजीनामा. सुनेत्रा पवार मनात म्हणत असतील “मी तर वाटच पाहत होते”. हा राजीनामा समर्पित डॉ. संपदा मुंडेंना, ज्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा प्रयत्न ह्यांनी केला. त्या प्रत्येक महिलेला ज्यांच्या वेदनांना न्याय मिळाला नाही. त्यांनाही ज्यांची प्रकरणे दाबली गेली. कर्माचे फळ चुकत नाही. ह्याच जन्मात भोगावं लागतं. राजीनामा देताना काय म्हणाल्या रुपाली चाकणकर? उल्लेखनीय बाब म्हणजे रुपाली चाकणकरांनी शुक्रवारी रात्री आपल्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना उद्देशून लिहिलेल्या राजीनाम्यात त्यांनी केवळ 'मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. त्याचा आपण स्वीकार करावा', अशी दोन वाक्य लिहिली आहेत. या राजीनाम्यासोबतच्या पोस्टमध्ये त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या, खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
तब्बल साडेपाच वर्षांनंतर झालेली महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी (27 मार्च)अक्षरशः थेट लाइव्ह ड्रामा ठरली. सभागृहात बसण्याच्या वादापासून सुरू झालेला गोंधळ पाणी योजनेच्या ठरावावरून चिघळला, नामकरणावरून एमआयएमने वॉकआऊट केला आणि शेवटी 22 कोटींच्या मुद्द्यावरून सभा तहकूब करण्याची वेळ आली. प्रशासनाला कोंडीत पकडण्यापासून, महापौरांच्या निषेधापर्यंत सर्व प्रकार पहिल्याच सभेत ठरले. महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आयुक्त जी. श्रीकांत यांची उपस्थिती होती. नगरसेवकांवर दीड दिवसाच्या आत गुन्हे दाखल करणाऱ्या प्रशासनाला 22 कोटींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर एफआयआर का करता येत नाही, असा सवाल केला. याचे प्रश्नासनाकडे काहीच उत्तर नव्हते. महाराणा एजन्सीच्या संपत्तीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले. गोंधळ वाढत गेला, महापौरांना सभा तहकूब करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तरीही घोषणाबाजी सुरूच होती. कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या कंपनीला दिलेल्या 22 कोटी रुपयांच्या जास्तीच्या देयकाचा मुद्दा उपस्थित झाला. एमआयएमचे नगरसेवक फिरोज खान, विरोधी पक्षनेते समीर बिल्डर आणि अशोक हिवराळे यांनी प्रशासनाला थेट प्रश्न विचारायला सुरुवात केली. ‘आठ टेबलवरून फाइल गेली, तरी एवढा घोळ कसा?’ असा सवाल उपस्थित झाला. वातावरण पुन्हा चिघळले. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. भाजपच्या प्रमोद राठोड यांनी या प्रश्नावरच प्रश्चचिन्ह उपस्थित केल्यानंतर वाद जास्तीच पेटला. काही सदस्य जागेवरून उठले. सभागृहाच्या बाहेर जाऊन केले ठिय्या आंदोलन या गोंधळादरम्यान संत बसवेश्वरांच्या पुतळ्याचा ठराव थांबवू का, असे म्हणत नगरसेवक सचिन खैरे यांना एक प्रकारे धमकीवजा इशाराच दिला. तेव्हा उद्धव ठाकरे, महात्मा बसवेश्वरांपेक्षा मोठे आहे का, असा उलट सवालही महापौरांनी केला. नगरसेवकांनी सभागृहाबाहेरच ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली.ते पुन्हा सभागृहात आले. मात्र, प्रस्ताव मान्य न झाल्यामुळे पुन्हा परतले. समीर राजूरकर यांनी त्यास नकार दिला. त्यावरून गणेश लोखंडे, सचिन खैरे, सावित्री वाणी, सुनीता सोनवणे, वैशाली कोरडे, लोखंडे यांच्यासह माजी महापौर रशीद मामू यांच्यासह उद्धवसेनेचे सहाही नगरसेवक महापौरांच्या समोर जाऊन उभे राहिले. त्यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतरही ते थांबले नाहीत. अभिनंदनाचा ठराव घ्यावाच लागेल, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. अखेर महापौरांनी 6 सदस्यांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. सुरक्षा रक्षकांनी अक्षरश: उचलून त्यांना सभागृहाच्या बाहेर नेल्याचे चित्र पाहायला मिळाले. 22 खोके एकदम ओक्के: एमआयएम ‘दिव्य मराठी’ने ‘गौडबंगाल’ ही वृत्त मालिका प्रकाशित केली. आठ टेबलवरून फाइल तपासली गेली, तरीही ठेकेदारांना २२ कोटी कसे जास्त गेले? नवीन ठेकेदारांना कंत्राट देण्यासाठी कसा खटाटोप आहे हे समोर आणले. हाच प्रश्न विरोधी पक्षाकडून विचारत प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. सभेचा शेवटचा टप्पा आणखी धक्कादायक ठरला. शहराचा पाणीप्रश्न सोडवल्याबद्दल भाजप, शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी मांडलेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार आदींच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. तर उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा मांडलेला ठराव नाकारला, यावरून उद्धवसेनेच्या सहा नगरसेवकांनी आपली मागणी लावून धरली. त्यापूर्वी भाजपचे राजू वैद्य यांच्यासह काही नगरसेवकांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. उद्धवसेनेचे गटनेते गणेश लोखंडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाणी योजना मंजूर केली. योजनेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले, याची आठवण करून देत, त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, मात्र महापौर सभा संपल्यानंतरीही एमआयएमच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर फलक दाखवत घोषणाबाजी केली.
विधिज्ञ असिम सरोदे यांनी भोंदू अशोक खरातसोबत फोटो असल्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राला मूर्ख समजत आहेत का? तुम्ही अंधश्रद्धा बाळगणारे आहात, तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा ही घटनात्मक जबाबदारी न पाळणारे आहात आणि खरात सोबत तुमचे विशेष फोटो असल्याने तुम्ही दोषी आहात, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना केवळ अशोक खरातसोबत फोटो असल्यामुळे कुणावरही कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच या प्रकरणी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचाही इशारा दिला. या पार्श्वभूमीवर वकील असिम सरोदे यांनी मुख्यमंत्र्यांवर उपरोक्त शब्दांत निशाणा साधला आहे. ते म्हणाले, अशोक खरात यांची ओळख सामाजिक कार्यकर्ते म्हणून होती का?, अशोक खरात शास्त्रज्ञ आहेत का?. 2004 पासून खरात हा माणूस अंकशास्त्र, ज्योतिष्य हेच करत वाढलेला आहे. कुणी सहज एखाद्या कार्यक्रमात अचानक भेटला व त्याने सोबत फोटो काढला ती गोष्ट वेगळी पण तुम्ही त्याला विशेष करून भेटायला जाता किंवा त्याला बोलावून त्याच्यासोबत विशेष मिटिंग ठेवता आणि आता म्हणता कि, खरातसोबत केवळ फोटो आहेत म्हणजे दोषी नाही! व्वा ! मुख्यमंत्री साहेब.... व्वा व्वा! महाराष्ट्राला तुम्ही मूर्ख समजता का? तुम्ही अंधश्रद्धा बाळगणारे आहात, तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा ही संविधानिक जबाबदारी न पाळणारे आहात आणि खरात सोबत तुमचे विशेष फोटो आहेत त्यामुळे तुम्ही दोषी आहात, असे त्यांनी म्हटले आहे. आत्ता पाहू काय म्हणाले होते फडणवीस? मुख्यमंत्री फडणवीस अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना म्हणाले होते, भोंदू अशोक खरातचे कुणासोबत फोटो किंवा व्हिडिओ येतात त्यावरून कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. त्यातील व्यक्तीचा प्रत्यक्ष सहभाग आहे का? हे महत्त्वाचे आहे. त्यात कुणाचा सहभाग असेल तर कारवाई होईल. नसेल तर केवळ फोटो आहे म्हणून कारवाई होणार नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की, या प्रकरणात कुणालाही सोडण्याचे कारण नाही. सरकार अतिशय खोलवर जात आहे. अनेक नव्या गोष्टी पुढे येत आहेत. अजून काही एफआयआर होण्याची शक्यता आहे. काही पीडित अजून पुढे येत आहेत. काही महिला पुढे येत आहेत. आर्थिक फसवणूक झालेल्या व्यक्तीही पुढे येत आहेत. त्यांचेही एफआयआर लवकरच पाहायला मिळतील. या प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ काही लोकांनी सोशल मीडिया साईटवर अपलोड केलेत. ते आम्ही काढून टाकलेत. पण ज्यांनी हे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केलेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. प्रस्तुत पीडितांना पूर्ण संरक्षण देण्यात आले आहे. यापुढेही ज्या महिला पुढे येतील त्यांना संरक्षण दिले जाईल. हे संरक्षण गोपनियतेचे आहे. काही जण ही गोपनियता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल, असे फडणवीस म्हणाले.
आता लढाई शेतीमालाच्या सन्मानजनक भावासाठी:एक दिवसीय लाक्षणिक उपोषणात बच्चू कडूंची घोषणा
aशेतकरी कर्जमाफीच्या लढ्याला सकारात्मक अर्थ देत माजीमंत्री बच्चू कडू यांच्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची सुरुवात शुक्रवारी (दि. २७) रक्तदानाने करण्यात आली. या उपोषणाच्या निमित्ताने कर्जमाफीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी व सहकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याचवेळी बच्चू कडू यांनी घोषणा केली कि, आता लढाई शेतीमालाला हमीभाव तसेच सन्मानजनक भाव मिळावा, यासाठी उभारणार आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा शेतकरी नेते महादेव जानकर, ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधीया आणि वामनराव चटप यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. आंदोलनाच्या काळातील संघर्षमय आठवणींना उजाळा देत, शेतकरी प्रश्नांवर पुढील लढ्याची दिशा देखील स्पष्ट करण्यात आली. यावेळी कर्जमाफीच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी असणारे परभणी जिल्ह्यातील दिव्यांग बांधव सूर्यभान मारोती ढगे यांची रक्ततुला करण्यात आली. तसेच आंदोलनांमध्ये सातत्याने कार्यकर्त्यांची सेवा करणारे, थकलेल्या आंदोलकांची काळजी घेणारे संजय गोमकाळे यांची बिजतुला करून सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे आंदोलनातील निस्वार्थी कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. बच्चू कडू यांनी भाषणात सांगितले की, शेतकऱ्यांचे जीवन आणि कष्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही लढाई आजही तितक्याच ताकदीने सुरू आहे. ही कर्जमाफी संघर्षाचा परिणाम आहे. आम्ही गांधीगिरीने लढायचे ठरवले आहे, पण गरज पडल्यास भगतसिंगगिरीनेही पुढे जाऊ. या संघर्षामुळे दिव्यांग, घरकुल आणि शेतमजूर योजनांमध्येही सकारात्मक बदल झाल्याचे त्यांनी नमूद केले. या उपोषणाच्या माध्यमातून शेतकरी प्रश्नांवर लढा सुरूच राहणार असल्याचा ठाम संदेश देण्यात आला. तसेच आंदोलनामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली, मोठे केले, त्या कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठीच मी आज रक्तदान केलं, असे म्हणताना बच्चू कडू भावूक झाले. यावेळी शेतकऱ्यांच्या पाठींब्यामुळेच यश कर्जमाफीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो तेव्हा टीका झाली, पण शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच हा निर्णय शक्य झाला. हे यश शेतकऱ्यांच्या पाठींब्यामुळेच मिळाले. या आंदोलनात बच्चू कडू यांचा पुढाकार महत्त्वाचा होता, असे जेष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप यांनी नमूद केले. थेट केंद्रीय कृषीमंत्र्यांना घेरण्याचा इशारा : बच्चू कडू यांनी ऑगस्ट महिन्यात ९ तारखेला मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. आगामी काळात शेतकरी प्रश्नांवर अधिक आक्रमक भूमिका घेत लढा तीव्र केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढील लढा थेट केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना घेरून लढला जाईल. कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट करत, या लढ्यात प्रतीकात्मक स्वरूपात प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार सोबत घेऊन जाणार असल्याचेही सांगितले. हा लढा शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचा विश्वासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या एकजुटीसमोर सरकारला झुकावे लागले शेतकऱ्यांच्या एकजुटीच्या ताकदीमुळेच सरकारला नमावे लागले. आपण पूर्णपणे विजयी झालो नसून सुमारे ८० टक्के यश मिळाले आहे. अनेक लोकं जाती-धर्मासाठी एकत्र येतात, मात्र शेतकऱ्यांसाठी एकत्र येणे अधिक गरजेचे आहे. नागपूर आंदोलनावेळी अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, पण एकही शेतकरी मागे हटला नाही, त्यामुळेच सरकारला निर्णय घ्यावा लागला, असे माजी मंत्री, शेतकरी नेते महादेव जानकर यांनी सांगितले.
येथील पोलिस ठाण्याच्या आवारात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा एका व्यक्तीने प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच त्या व्यक्तीला थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी पोलिसांनी अंगावर डिझेल घेणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या पत्नीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हा प्रकार शुक्रवारी (दि. २७) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडला आहे. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने व त्यांच्या कुटुंबियांनी यापूर्वीच आत्मदहन करणार असल्याचा इशारा पोलिसांना दिला होता. दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील रामगाव येथे रामभाऊ भगवान झिपरकर यांच्यावर जागेच्या वादातून १२ मे २०२५ रोजी बोडखे कुटुंबातील सदस्यांनी एकत्रीतपणे येऊन हल्ला केला होता. या घटनेत रामभाऊ झिपरकर यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान रामभाऊ झिपरकर यांच्या स्नुषा सारीका संजय झिपरकर यांनी खल्लार पोलीस ठाण्यात त्यावेळी खुनाची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून खल्लार पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन दहा जणांना अटक केली होती. दरम्यान या गुन्ह्याच्या तपासात खल्लारच्या तत्कालीन ठाणेदारानी हलगर्जीपणा केला तसेच अन्य गंभीर गंभीर आरोप सारिका झीपरकर यांनी केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात सखोल चौकशी करुन दोषी आढळणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करावी, अशी मागणी सारीका झिपरकर यांनी पोलिस अधिक्षकांकडे केली. तसेच याच मागणीसाठी २७ मार्चला आत्मदहन करण्याचा इशारासुद्धा दिला होता. दरम्यान वरिष्ठांकडे तक्रार देवुन सुध्दा न्याय न मिळाल्याने शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान तक्रारदार सारीका संजय झिपरकर व त्यांचे पती संजय रामभाऊ झिपरकर हे दर्यापूर पोलिस स्टेशन आवारात दाखल झाले. यावेळी संजय झीपरकर यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर दर्यापूर पोलिसांनी झिपरकर दाम्पत्याला ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती ठाणेदार वानखडे यांनी दिली.
अगदी १० दिवस आधीपर्यंत अस्वच्छता, कचऱ्यावरून शहरात आगडोंब उसळला होता. विरोधकच काय पण, सत्तापक्षातील नगरसेवकही मनपा प्रशासन, शहर स्वच्छतेचे नवे कंत्राट मिळवणारी कोणार्क कंपनी व स्वच्छता विभागावर तुटून पडले होते. शहर स्वच्छता अधिकाऱ्यांविरोधात रोष अन् निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या गळ्यात हार घालण्याचा प्रयत्न झाला. विरोधक तर अस्वच्छतेवरून आंदोलन करायला लागले. शहराच्या विविध भागात आंदोलनं करण्यात आली. परंतु, १५ मार्च रोजी मनपा प्रशासनाने कामात त्रुटी आढळल्याने कोणार्कला ९.६५ लाखाचा दंड काय केला. शहरात जणू अस्वच्छताच नाही, २२ प्रभाग व सुमारे १० लाख लोकसंख्येचे शहर पूर्णपणे स्वच्छ झाले, अशा पद्धतीने विरोधक, सत्तापक्षातील नगरसेवक, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वच शांत बसले आहेत. अचानक असे काय घडले की, कोणीही १७ रोजी झालेल्या आमसभेत शहराच्या अस्वच्छतेवर ना गोंधळ घातला ना गदारोळ. त्यामुळे शहरवासीही चकित झाल्याशिवाय राहिले नाहीत. शहरात अजुनही फेरफटका मारला तर सर्वत्र अस्वच्छता, घाण पसरलेली दिसून येते. ज्या पद्धतीने स्वच्छतेचे काम व्हायला हवे, असे ते अजुनही सुरू झाले नाही. मनपा पदाधिकारी, सर्वच पक्षांचे नगरसेवक आता शहर स्वच्छतेचे कंत्राट देणाऱ्या कोणार्कला स्थिती सुधारण्यास तीन महिन्यांची वेळ द्यायला हवी, असे म्हणत आहेत. या सर्वाचे अचानक मतपरिवर्तन कसे झाले, हा देखील एखादवेळी संशोधनाचा विषय ठरू शकतो. नागरिकांनी आम्हाला निवडून दिले. त्यांना नागरी सुविधा देणे कर्तव्य असल्याची भाषा बोलणारे अचानक कसे थंडावले असा गहन प्रश्न आहे. नाल्यांची स्वच्छता होत नसून, घरातून कचरा संकलनही दररोज होत नाही. कचरा जाळल्याने प्रदूषणात वाढ होत असल्यामुळे मनपाने कचरा जाळण्यास बंदी घातली असताना. शहरात विविध ठिकाणी ठेवलेल्या कचरा कंटेनरमधील कचऱ्याची उचल न करता तो जाळला जात असल्याचा अजब प्रकार दिसून येत आहे. आधीच्या झोननिहाय कंत्राटदारांनी हे कंटेनर तसेच सोडले आहेत. त्यांनी ते उचलून कंपोस्ट डेपोमध्ये रिकामे करणे आवश्यक होते. परंतु, त्यांनी हात वर केले. आता नवीन स्वच्छता कंत्राटदार कोणार्ककडे हे मोठे कंटेनर उचलण्याची यंत्रणा नाही. त्यांच्याकडे लहान कंटेनर उचलण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे नाईलाजाने मोठ्या कंटेनरमधील कचरा जाळला जात असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले. मनपा प्रशासनाने आदेश दिल्यानंतरही प्रभाग क्र. १ शेगांव-रहाटगांव आणि प्रभाग क्र. ५ महेंद्र कॉलनी-नवीन कॉटन मार्केटमध्य कोणार्क कंपनीने १३ व १४ मार्च असे दोन दिवस स्वच्छतेचे कामच सुरू केले नाही. त्यामुळे कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लि.ला ९.६५ लाखाचा दंड ठोठावण्यात आला. हा दंड जर कंपनीने रोख स्वरूपात भरला नाही तर तो त्यांच्या महिन्याच्या देयकातून कापला जाईल. मात्र, ते खरेच दंड भरतील काय, असे साहजिकच प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. कारण, कामात शिस्त महत्त्वाची आहे. यंत्रणेचा अभाव: घंटागाड्या कमी शहरात कचरा संकलनासाठी आवश्यक असलेल्या घंटागाड्यांची संख्या अपुरी आहे. ६ वरून संख्या १० केली असली, तरी १० लाख लोकसंख्येसाठी ती अत्यंत तोकडी आहे. दंडाचा ‘फार्स' : किंवा कारवाई कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर'ला कामात त्रुटी आढळल्याने ९.६५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड कंत्राटदाराच्या मासिक देयकातून यंदाच्या वर्षी कापला जाणार आहे. महापौरांचे ‘कवच': नागरिकांचा प्रश्न महापौर श्रीचंद तेजवानी यांनी कंत्राटदाराला कामात सुधारणा करण्यासाठी ३ महिन्यांचा अवधी दिला आहे. तोपर्यंत नागरिकांनी अस्वच्छता सहन करायची का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. श्रीचंद तेजवानी, महापौर राजकीय ‘यू-टर्न'; मुद्दाच मांडला नाही अवघ्या १० दिवसांपूर्वी अस्वच्छतेवरून आक्रमक झालेले सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक अचानक शांत का? १७ तारखेच्या आमसभेत एकाही लोकप्रतिनिधीने अस्वच्छतेचा मुद्दा लावून धरला नाही. Q. शहरात अस्वच्छता असतानाही सर्व गप्प का आहेत? A. हळूहळू परिस्थिती रुळावर येत आहे. सफाई कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवली आहे. त्यामुळे काही प्रमाणात स्वच्छता होताना दिसत आहे. Q. शहर स्वच्छ, सुंदर होण्यास आणखी किती दिवस लागणार? A. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चरने नुकतेच काम सुरू केले आहे. त्यांना तीन महिन्यांचा वेळ दिला. या कालावधीत त्यांना कामात पूर्णपणे सुधारणा करावीच लागेल. Q. शहरातील अनेक परिसरांमध्ये दररोज घंटागाडी पोहोचत नाही, असे का? A. आधी कोणार्ककडे घंटागाड्यांची संख्या ६ होती. आता ती १० पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यात आणखी काही घंटागाड्यांची भर पडणार असल्याने दररोज घंटागाडी कचरा सकलन करताना दिसेल. Q. शहरात मोठ्या प्रमाणात कचरा का साठला? A. मनपा प्रशासनाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात या समस्येकडे दुर्लक्ष झाले. आम्ही आता कारभार हाती घेतला. अस्वच्छतेची स्थिती सुधारण्यास काही वेळ लागेल. Q. कामात हयगय आढळल्यास दंड करणार काय? A. कामातील शिस्तीच्या बाबतीत मी काटेकोर आहे. स्वच्छता कंत्राटदाराला नुकताच ९ कोटीच्या वर दंड केला. भविष्यात कामचुकारपणा दिसला तर निश्चितच दंड करणार. कंटेनरमधील कचरा जाळला जातोय
भारताच्या इतिहासातील महान सम्राट अशोक यांच्या समता, बंधुता,लोकशाही, लोककल्याण, अहिंसेच्या विचारांचा व धोरणांचा प्रसार करून समाजात नवी दिशा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित राज्यस्तरीय अशोक पर्व महोत्सव हा परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय आठवले यांनी व्यक्त केला. ते महोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत बोलत होते. सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी घराघरात अशोक' ही अभिनव संकल्पना राबवण्यात येणार असल्याचे पॅक्टोचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे यांनी सांगितले. सम्राट अशोक प्रतिष्ठान व फुले आंबेडकर शिक्षक संघटनेतर्फे (पॅक्टो) अशोक जयंतीनिमित्त अभिवादन व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी भगवान बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी फुले आंबेडकर शिक्षक संघटना पॅक्टोचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे, प्रा. सुनील कांबळे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल गवई, प्रा. शैलेश इंगळे, विद्याधर मोहोड, प्रा. विवेक पांडे, प्रा. सज्जन जाधव, प्रा. धम्मानंद नवघरे, मनोहर इंगळे, सुमेध घनबहादूर, संदेश गवई, अॅड. मंगेश बोदडे, अॅड. प्रकाश आठवले, किशोर शिरसाट, बाळकृष्ण शिरसाट, रोहित जगताप, आकाश पवार आदी उपस्थित होते. सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी घराघरात अशोक' ही अभिनव संकल्पना राबवण्यात येणार असल्याचे मत याप्रसंगी पॅक्टोचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे यांनी व्यक्त केले. अशोक पर्वातून समाजात समता, बंधुता आणि शांततेच्या मूल्यांची प्रभावी रुजवात होईल, असा विश्वास अशोक प्रतिष्ठानचे सचिव प्रा. सुनील कांबळे यांनी व्यक्त केला. अकोल्यातून सुरू होणारी ही अशोक विचारांची मशाल राज्यभर सामाजिक परिवर्तनाची नवी चळवळ उभी करेल, असा आशावाद व्यक्त करत सर्व समाजघटकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गवई , विद्याधर मोहोड यांनी केले. विविध समित्यांचे गठन; नियोजनाला वेग : अशोक पर्व महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वागत समिती, व्यवस्थापन समिती, प्रसिद्धी समिती, सांस्कृतिक कार्यक्रम समिती तसेच युवक व महिला आघाडी अशा विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. प्रत्येक समितीवर अनुभवी व कार्यक्षम पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने कार्यक्रमाच्या नियोजनाला वेग आला आहे. हे राहणार उपस्थित महोत्सवात अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे, किसान ब्रिगेडचे नेते प्रकाश पोहरे, आमदार धीरज लिंगाडे, आमदार सिद्धार्थ खरात, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, उद्योजक सुगत वाघमारे, तहसीलदार राहुल तायडे, डॉ. संतोष हुशे, सिनेट सदस्य डॉ. संतोष बनसोड, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. जगदीश बक्तुरे, कर अधिकारी विनोद विरघट, किरण लहाने, प्रा. प्रवीण कावळे, भवनसुंदर वानखडे, भीमराव परघरमोल, कवी नितीन चंदनशिवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
काकाची हत्या करून नैसर्गिक मृत्यूचा बनाव करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गळा आवळून हत्या केल्यानंतर मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदन अहवालातील धक्कादायक निष्कर्ष आणि पोलिसांच्या तपासातील तत्परता यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिस स्टेशन हद्दीतील वाई (माना) गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पुतण्या आणि वहिनीला अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू वाटणाऱ्या या घटनेमागे थरारक सत्य दडलेले असल्याचे तपासात उघड झाले आहे. वाई (माना) येथील संजय रामकृष्ण भटकर (वय ५०) हे २६ मार्च रोजी सकाळी घरामागील गोठ्यात मृत अवस्थेत आढळून आल्याची फिर्याद त्यांचा पुतण्या स्वप्नील विनोद भटकर (वय २५) याने माना ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले. मात्र पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत तपास सुरू केला. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे, स्था. गु. शा. अकोलाचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांचे मार्गदर्शन मिळाले. ठाणेदार नावकार, पोलिस उपनिरीक्षक महाजन, पो. हे. कॉ. संदीप सरोदे, पो. कॉ. जावेद खान, मंगेश पवार, म. पो. कॉ. जयश्री मेंढे यांनी कारवाई पार पाडली. माना पोलिसांनी काही तासातच खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्यामुळे कौतुक करण्यात येत आहे. घरगुती प्रकराणचा तत्पपरतेने तपास करून मुख्य आरोपिस तत्काळ सजा मिळाल्यामुळे वाई (माना) गावामधील ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले व पोलिसांकडून अशाच पद्धतीचे जलदगतीने तपास व्हावेत अशी अपेक्षा देखील या निमित्ताने व्यक्त केली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. वैद्यकीय अहवालात मृत्यूचे कारण ‘गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून मृत्यू’ असे नमूद करण्यात आले होते. यानंतर हे प्रकरण नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान या घटनेचे गांभीर्य सक्षात घेत माना पोलिस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. यासाठी अनेक साक्षी पुरावे देखील तपसण्यात आली. गोपनीय माहिती मिळवली या माहितीच्या आधारावरच पोलिसांना समजले की, घरगुती वादातून ही हत्या करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिसांच्या तल्लख तपासामुळे आरोपींना लवकरच अटक करण्यात यश आले. पोलिस प्रशासनाला यश देखील आले आहे.
‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. निराधार आभाळाचा तोच भार साहे..’ निराधारांना ईश्वर आधार देतो, हा विश्वास व्यक्त करणाऱ्या भावगीताची प्रचिती शेगाव रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे रुळावर गंभीर अवस्थेत पडलेल्या एका ५५ वर्षीय निराधार महिलेला अकोला ‘जीएमसी’त आली. शेगाव रेल्वे पोलिसांनी तिला गंभीर अवस्थेत अनोळखी म्हणून अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी गेले महिनाभर तिची आस्थेवाइकपणे देखभाल आणि सुश्रुषा केली. तिच्यावर अवघड शस्त्रक्रिया करून तिला जीवनदान दिले. शेगावात गेल्या महिन्यात राष्ट्रपती दौपदी मुर्मू येणार म्हणून रेल्वे स्थानकाच्या परिसरात उघड्यावर राहणारे भिकारी, निराधारांना तेथून हुसकावून लावण्यात आले. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात आसरा शोधण्याच्या प्रयत्नात फिरणाऱ्या बेघर शांताबाई जाधव यांना २२ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास रेल्वेचा धक्का बसला त्यात त्यांचे दोन्ही हात कापले गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. शेगाव येथील रेल्वे पोलिस पांडुरंग वसू यांनी तिला त्याच दिवशी रात्री अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचलित सर्वोपचार रुग्णालयात वॉर्ड क्रमांक २६ मध्ये भरती केले. अनोळखी महिला म्हणून तिच्यावर आठ दिवस सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी तिची सुश्रुषा केली. ती शुद्धीवर आल्यानंतर तिची आेळख पटली. जवळचे कुणी नातेवाईक नाही. कुणाचा आधार नाही, असे तिने डॉक्टरांना सांगताच डॉक्टरांनी अधिक आपुलकीने तिची विचारपूस करुन तिला धीर दिला. गेले महिनाभर तिच्यावर सर्जरी विभाग अंतर्गत वॉर्ड २६ मध्ये शस्त्रक्रिया झाल्या. ती आता डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. शामकुमार शिरसाम यांच्या नेतृत्वामध्ये या निराधार रुग्ण महिलेवर सर्जरी विभागाचे विभागप्रमुख डॉ. अरविंद आडे, पथक क्रमांक ३ चे पथ प्रमुख डॉ. रवी खंडारे, डॉ. प्रवीण दंदी, डॉ. बालाजी लांडगे हे रुग्णावर उपचार करत आहेत. वॉर्ड परिसेविका संगीता चिमणकर, परिचारिका कविता शिंदे, परिचारक योगेश राणे, अनिल खरात, सतीश उकर्डे, शुभम भिंगे तसेच कक्ष सेवक अभिषेक गवई आणि सफाई कामगार शाम निनोरे रुग्णाची देखभाल व काळजी घेत आहेत. दानशुरांकडून रुग्णासाठी डायपरची व्यवस्था महिला रुग्णाला बेडवरून उठता येत नाही, रेल्वे अपघातात दोन्ही हात कापले गेले आहेत. त्यामुळे डायपरची व्यवस्था शहरातील अथर्व मल्टिपर्पज फाउंडेशनचे दानशूर अनिल मुळे यांच्याकडून रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे यांनी प्रयत्न करून मिळवून दिली आहे. ही महिला आजारातून बरी झाल्यानंतर तिचे समुपदेशन आणि पुनर्वसनासाठीही आपले प्रयत्न आहेत.
पावसाळ्यात सतत पाऊस झाल्यामुळे पेरणीसाठी वापसा आला नाही ,ज्वारीच्या हंगामात पेरणी करता आली नाही, त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केली. ज्वारीचे सरासरी क्षेत्र ३४ हजार १३५ हे असून तालुक्यात १९ हजार ८२९ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पेरणी करण्यात आली होती. मंगळवेढ्याच्या काळ्या शिवारातील ज्वारीचा कडबा कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, तासगाव, कवठेमहंकाळ, खोपोली, अहिल्यानगर या भागात विक्रीसाठी जात असल्यामुळे या भागात दर ही चांगला मिळत आहे. त्यामुळे यावर्षी ज्वारीच्या कडबा विक्रीतून शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. यंदा मात्र कडबा पेढींचा शेकडा दर २२०० ते २५०० पर्यंत पोहोचला आहे. ज्वारीचा उत्पादन खर्च व मिळालेले उत्पन्न यात तफावत असल्यामुळे शेतकरी ज्वारीचे पीक घेण्यास तयार नसताना, चालू वर्षी ज्वारीला व कडब्याला चांगला दर मिळाला आहे, कडब्याच्या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना ज्वारीचे पीक परवडले आहे. मंगळवेढा शिवारातील कडबा दिवसभर ट्रक, टेम्पो यामध्ये भरताना दिसत आहेत. मंगळवेढा शहराच्या जवळपास असणाऱ्या काळ्या शिवारातील ज्वारीचा कडबा हा केवळ पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या एक मुळीचा असणारा कडबा तीन प्रकारामध्ये मोडतो उंच, मध्यम आणि ढाणडाळ (वाकडा किंवा पडलेला ), सद्या पालेदार व उच्च प्रतीच्या कडब्यासाठी २५ हजार रुपये दर असून मध्यम प्रतीच्या कडब्याला २२ हजार रुपये दर मिळत आहे, तर सर्वसाधारण कडब्याला १९ ते २० हजार रुपयापर्यंत मिळत आहे. ज्वारीचा उत्पादन खर्च व ज्वारीला मिळणारा दर ,यामुळे शेतकरी ज्वारीचे पिक घेण्यासाठी तयार होत नाहीत. मात्र चालू वर्षी ज्वारी व कडब्याचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत होत आहे. कडबा साठवण्यासाठी शेतकऱ्याकडे मंगळवेढा शहरांमध्ये जागा उपलब्ध नाही व कडबा साठवण करण्यासाठी ढेपण रचावी लागते ते रचत वर्ष कडब्याचे दर २०२२ ९ ते १२ हजार २०२३ १५ ते २० हजार २०२४ १० ते १५ हजार २०२५ १८ ते २१ हजार २०२६ २० ते २५ हजार ^ज्वारी करणे सध्या परवडत नाही. निसर्गाची हेळसांड तसेच हमीभाव नसल्यामुळे ज्वारीला दर मिळत नाही. ज्वारीचा उत्पादन खर्च व मिळणारा दर यात तफावत असल्यामुळे शेतकरी ज्वारी करणे त्रासदायक होते. मात्र यावर्षी ज्वारी व कडबा विकून फायदा मिळत आहे. येथील कडबा शेकडा २ हजार, अडीच हजार रुपये दराने खरेदी करून कोल्हापूर, सातारा, पुणे या ठिकाणचे व्यापारी व पशुपालक घेऊन जात आहेत. मधुकर घुले, शेतकरी मंगळवेढा रचत असताना त्यातले तज्ञ व निष्णात लोकांकडून रचली जाते. ढेपण रचण्यासाठी मजुरी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. १ हजार कडबा गोळा करण्यासाठी १ हजार रुपये मजुरी द्यावी लागते. कडबा शिवारातून शहरात वाहतूक करून आणण्यासाठी एका ट्रकला ३ ते ३५०० हजार रुपये (भरणी) मजुरी घेतली जाते. गंज लावण्यासाठी एक गडी रोज १ हजार रुपये घेतो व पेंड्या उचलून वर टाकणारे १ हजार रुपये घेतात. एक गंज लावण्यासाठी साधारणतः ५ दिवस लागतात. त्यामध्ये ५ हजार कडबा रचला जातो. त्यामुळे आजच्या काळात गंज लावण्यासाठी परवडत नसल्यामुळे शेतकरी गंज लावत नाहीत. त्यामुळे सध्या इतर भागात विक्रीसाठी कडबा मोठ्या प्रमाणावर जात असल्यामुळे शिवारात कडबा अतिशय कमी प्रमाणात दिसून येत आहे. हमीभाव नसल्यामुळेज्वारीला दर मिळत नाही असे आहे कडब्याचे दर
अवकाळी पावसासह गारपिटीमुळे बुधवार दि.२५ मार्च रोजी जिल्ह्यातील ११ तालुक्यातील झालेल्या पिक नुकसानीत मोहोळ, माळशिरस या दोन तालुक्यातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तर उत्तर सोलापूर, अक्कलकोट, माढा, सांगोला, मंगळवेढा या पाच तालुक्यांना मध्यम स्वरूपाचा तर पंढरपूरला सर्वाधिक कमी तर दक्षिण सोलापूर, बार्शी, करमाळा या तीन तालुक्यांना दिलासा मिळाला आहे. गारपिटीचा २४३९ हेक्टर पिकांना फटका बसला आहे. विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्या बरोबरच पावसासह गारांचा वर्षाव होऊन जिल्ह्यातील १७० गावातील ३४२३ शेतकऱ्यांचे एकूण २४३९.०५ हेक्टर शेती पिकाचे नुकसान झाले आहे. केळी, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, भोपळा, खरबूज, ढोबळी मिरची, पेरू, डाळिंबासह नुकसानीमध्ये इतर पिकांचा समावेश असून तालुका पातळीवरून पीक नुकसान पाहणी महसूल अधिकाऱ्यांबरोबर सर्कल अधिकारी देखील प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन करण्याचे काम सुरू आहे. या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई शासन कोणत्या दराने देणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र मागील ६ महिन्यापूर्वी पुरासह पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नसल्याने जगाचा पोशिंदा हवालदिल झाला आहे. ^पावसासह गारपिटीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पिक नुकसानीची गावनिहाय माहिती घेऊन अहवाल वरिष्ठांकडे देत आहे.३४२३ शेतकऱ्यांचे एकूण २४३९.०५ हेक्टर शेती पिकाचे नुकसान झाले आहे. केळी, आंबा, द्राक्षे, खरबूजाचे नुकसान झाले. सचिन मुळीक, तहसीलदार मोहोळ ^वादळी वाऱ्यासह पावसामुळे द्राक्ष, आंबा, डाळिंबसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ्यातील अतिपावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीचा अद्याप बहुतांश शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. तोपर्यंत दुसरे संकट आले आहे. मागील नुकसानीच्या मोबदल्यासह सध्याच्या नुकसानीचा मोबदला त्वरित बँक खात्यावर जमा करावा. राहुल गोडसे, शेतकरी येवती
विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या गर्दीने पंढरी नगरी फुलून गेली आहे. या वर्षीची चैत्री एकादशी यात्रा रविवार, २९ मार्च रोजी साजरी होत असून, यात्रेचा मुख्य कालावधी २३ मार्च ते २ एप्रिल असा आहे. शुक्रवारी भाविकांची संख्या एक लाखांच्या पार पोहोचली असून मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट आणि ६५ एकर क्षेत्रात फक्त सात दिंड्यांचे बुकिंग झाले आहे. तर यंदाच्या यात्रेवर इंधन टंचाईचे सावट दिसत आहे. वाढते तापमान लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष खबरदारी घेतली आहे. दर्शनासाठी १० वॉटरप्रूफ पत्राशेड सज्ज करण्यात आले असून, तिथे थंड व शुद्ध पिण्याचे पाणी, लिंबू सरबत, पंखे आणि कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी विशेष स्टॉलही उभारले आहेत. शुक्रवारी दुपारी सारडा भवन पर्यंत दर्शन रांगेतील भाविक उभा होते. पोलीस बंदोबस्त तैनात यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वाहतुकीचे नियोजन सुलभ व्हावे, यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ६५ एकर, प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंटात चोवीस तास गस्त घातली जात आहे. . दर्शनाची वेळ: भाविकांच्या सोयीसाठी दर्शनाची वेळ वाढवण्यात आली असून, आता सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत दर्शन घेता येईल. . व्हीआयपी दर्शनावर मर्यादा: यात्रेच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी टोकन दर्शन, विशेष पूजा आणि व्हीआयपी दर्शनावर कडक निर्बंध. . स्वच्छता आणि आरोग्य: ६५ एकर आणि वाळवंट परिसरात फॅब्रिकेटेड शौचालये उभारली असून, शहरात अतिक्रमण मोहीम राबवली आहे. यंदाच्या यात्रेवर इंधन टंचाईचे सावट दिसत आहे, स्वयंपाकासाठी आवश्यक गॅसची उपलब्धता होणार की नाही, सोबत येणाऱ्या वाहनांना पुरेसे पेट्रोल डिझेल मिळणार की नाही याबाबत साशंकता असल्यामुळे भाविकांची संख्या आणि दिंड्यांची ही संख्या यंदा कमी राहील असा अंदाज व्यक्त होत आहे. गेल्या चार दिवसांपासून ६५ एकर येथील मैदानात दिंड्यांच्या बुकिंगसाठी महसूल विभागाची यंत्रणा सज्ज आहे, परंतु शुक्रवार दि २७ मार्च रोजी दुपारी २ वाजेपर्यंत केवळ ७ दिंड्यानी भूखंडासाठी बुकिंग केले आहे. चैत्री यात्रेसाठी दरवर्षीच्या मागणी प्रमाणे पुरवठा विभागाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, नगरपालिका मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्या शिफारस पत्राद्वारे १२०० गॅस सिलिंडर ची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे. चैत्र शुद्ध नवमी निमित्त पंढरीत एक लाखावर भाविक आलेले आहेत, परंतु शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत एकही सिलेंडर उपलब्ध झालेले नाही, सिलेंडरचा पुरवठा होईल, असे पत्रही गॅस एजन्सी किंवा पुरवठा विभागाला मिळालेले नाही. त्यामुळे भाविक गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी वणवण करताना दिसत आहेत. १२०० सिलेंडरची मागणी, अद्याप एकही मिळाले नाही शिखर शिंगणापूरच्या कावडींचे आगमन चैत्री यात्रेचे आणखी एक आकर्षण म्हणजे शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या कावडी. मराठवाड्यातून आलेल्या या कावडींनी श्री विठ्ठल मंदिराच्या संत नामदेव महाराज महाद्वारावर दर्शन घेतले. ‘हर हर महादेव'च्या जयघोषात नामदेव पायरीवर जलाभिषेक करून या कावडी आता शिंगणापूरकडे मार्गस्थ होत आहेत. भाविकांची, दिंड्यांची संख्या यंदा कमी राहील असा अंदाज
आकाशाला गवसणी घालणाऱ्या कावडी आणि काठया,शिगेला पोहोचणारा पारंपरिक हलगी वाद्यांचा गजर. बेभान होऊन नाचणारी तरुणाई.. गुलाल भंडाऱ्याची मुक्त उधळण, फटाक्यांची नेत्र दीपक आतषबाजी अशा अतिशय उत्साही वातावरणात भवानी उत्पत्ती चैत्र शुद्ध अष्टमी व राम नवमी अशा दुग्ध शर्करा योगावर मध्यरात्री एक वाजता नातेपुतेचे ग्रामदैवत श्री गिरीजापती शंभू महादेवाचा विवाह सोहळा हजारो भाविकांच्या व मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावर्षी कुरवलीचा मान असणारी मराठवाड्यातील भातगंळीची काठी विवाहाच्या अगोदर एक तास उपस्थित राहिली. काठीच्या मानकऱ्यांनी शंभू महादेवास आहेर देऊन विधिवत लग्न पूजेस विधिवत लग्न सोहळ्यास होकार दिला. दिवसभर घराघरांतून पुरणपोळीचा नैवेद्य करून देवास केळवण करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता सालकरी बडवे यांच्या घरांतून पालखी-छबिना मिरवणूक निघाली. त्यावेळी पालखी समोर देगलूर (जि. नांदेड ) येथील मानकऱ्यांनी वाद्य वाजवून सेवा अर्पण केली. रात्री ९ वाजता मंद्रे (साळी ) कुटुंबीयांनी सवाद्य मिरवणूक काढून धज बांधली, त्यानंतर मुख्यविधीस सुरुवात झाली. राज्यभरातून ३५ कावडी दाखल झाल्या होत्या. ग्रामजोशी बडवेंनी मंगलाष्टके गायली. नातेपुते येथील विवाह सोहळा झाल्यावर शिखर शिंगणापूरला विवाह विधी होतात. शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे मूळस्थान मानून नातेपुते येथील गिरजापतीची पूजा केली जाते. यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने दोन दिवस हजारो यात्रेकरूंना अन्नदान करण्यात आले. राज्यभरातून आल्या कावडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः मराठवाडा विदर्भातील मानांच्या ३५ काठ्यांची मंदिर प्रदक्षिणा झाली. त्यानंतर रात्री १०.३० वा. नंतर नातेपुतेथील पाटील,सुतार काळे पाटील,पोटे, परिवार, बोराटे,लांडगे तसेच परिसरातील मानांच्या कावडी विवाह व गिरजापतीस धार घालण्यासाठी विठ्ठल मंदिर येथील मठातून पवित्र जल घेऊन मंदिरात यायला सुरुवात झाली. फटाक्याच्या आतषबाजीत जल्लोषात गुलाल भंडारा उधळत कावडी विवाह सोहळ्यात दाखल होत होत्या. नातेपुते येथील पाटील परिवारास नवरीचा मान, माळशिरस येथील वाघमोडे पाटील यांना नवरदेवांचा मान, देशमुख, देशपांडे परिवारास करवलीचा मान आहे. या यात्रेत प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना विविध मान आहेत.व ते श्रद्धेने भक्तीने सहभागी होऊन आपली सेवा रुजू करतात. त्यानंतर मुख्य गाभाऱ्यातील विधी झाल्यानंतर विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला. नवरीचा मान उपनगराध्यक्ष अतुल पाटील, नवरदेव माळशिरसचे अमित वाघमोडे-पाटील, कुरवलीचा मान देशमुख परिवारातील राजाभाऊ देशमुख यांनी व देशपांडे परिवाराने पार पाडला.
भगवान परमात्मा हा डोळ्याने दिसत नाही. साधुसंतांनी त्यांना मनाने प्राप्त केले आहे. जीवाला शिवामध्ये घेऊन जाण्याची ताकद संतामध्ये असल्याने संत जगात सर्वात श्रेष्ठ आहेत. नेवासे ही संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी असल्याने हे क्षेत्र ब्रम्हविद्येचे माहेर आहे. जीवनात अंध नाही तर डोळसपणे परमार्थ करा. निर्मळ मनाने भगवंताची भक्ती करा असे आवाहन साध्वी सुवर्णानंद महाराज चैतन्य यांनी केले. नेवासे तालुक्यातील रामनगर येथील महंत सुनीलगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम साधना आश्रमात रामनवमी निमित्ताने आयोजित श्रीराम जन्मोत्सव पंचदिनात्मक सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. जीवाला शिवामध्ये घेऊन जाण्याची ताकद संतामध्ये असल्याने संत जगात सर्वात श्रेष्ठ आहेत. रामराज्य जर टिकवायचे असेल तर आधी जातीभेद नष्ट करा असे आवाहन साध्वी सुवर्णानंद चैतन्य महाराज यांनी केले. या सोहळयासाठी योगदान देणाऱ्या दात्यांचा श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरी महाराज व साध्वी सुवर्णानंदगिरी महाराज चैतन्य, महंत मुक्तानंद महाराज यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत महंत सुनीलगिरी महाराज, महंत मुक्तानंदगिरी महाराज, साध्वी सुवर्णानंद महाराज चैतन्य यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून पंचदिनात्मक श्रीराम जन्मोत्सव सोहळयाची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांच्या गर्दीने श्रीराम साधना आश्रमाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. यावेळी माऊली आश्रमाचे प्रमुख हभप ज्ञानेश्वर महाराज हजारे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, साहेबराव महाराज चावरे, हभप भिसे महाराज, वैभव निकम, सीताराम निपुंगे, पोपटराव निपुंगे, संदीप ताकपेरे, प्रशांत पवार, आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामराज्य टिकवण्यासाठी जातीभेद नष्ट करा जीवाला शिवामध्ये घेऊन जाण्याची ताकद संतामध्ये असल्याने संत जगात सर्वात श्रेष्ठ आहेत. रामराज्य जर टिकवायचे असेल तर आधी जातीभेद नष्ट करा असे आवाहन यावेळी उपस्थित भाविकांनी साध्वी सुवर्णानंद महाराज चैतन्य यांनी केले.
साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री रामनवमी उत्सवाला यंदाही चांगला प्रतिसाद मिळाला. उत्सवाच्या तीन दिवसांत राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे तीन लाख भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. गतवर्षीच्या तुलनेत २५ हजार भाविक जास्त होते. मुंबईसह देशाच्या विविध भागांतून आलेल्या पालख्यांतील भाविकांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी नगरी दुमदुमून गेली. गुरूवारी उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे काकड आरतीने कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर श्री साईसच्चरित्राच्या अखंड पारायणाची सांगता करण्यात आली. पारायणानंतर श्रींचे फोटो, पोथी, वीणेची मिरवणूक काढण्यात आली. यानंतर कावड मिरवणूक, मंगलस्नान, पाद्यपूजा आणि ध्वजपूजनाचे विधी पार पडले. द्वारकामाईतील गव्हाच्या पोत्याचे पूजन करून नवीन पोते ठेवण्यात आले. सकाळी ह.भ.प. विक्रम नांदेडकर यांचे श्रीराम जन्मोत्सव कीर्तन झाले. सायंकाळी निशाण मिरवणूक आणि श्रींच्या रथाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रसिद्ध संगीतकार आनंद-मिलिंद यांच्या साईभजन संध्येला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुख्य दिवशी समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. या दिवशी नांदेड येथील साईभक्त विठ्ठल झुडपे यांनी २३०० ग्रॅम वजनाची चांदीची वीट अर्पण केली, तर शिर्डीतील तुकाराम मुखेकर यांनी ५० क्विंटल गहू साईचरणी अर्पण केला. उत्सवाच्या सांगता दिनी ह.भ.प. विक्रम नांदेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. तात्या पाटील कोते यांच्या वंशज अभिराज मिलिंद कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. गॅसची बचत करत सोलारचा मुबलक वापर प्रचंड उष्णता आणि इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने गॅसची बचत करण्यासाठी सोलार प्रणालीचा अधिकाधिक वापर केला. सोलार स्टीम तयार करून त्यात बटाटो, दाळ, भात शिजवण्यात आले. परिणामी गॅसची बचत झाली आणि तुटवडा जाणवला नाही. उत्सवातील तीन दिवसांत सुमारे १ लाख ६२ हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. गर्दी असूनही फक्त २ ते ३ तासांत सुकर दर्शन व्यवस्था होत होती. देशाच्या विविध भागांतून ९७ पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या होत्या.
महापालिकेच्या अंदाजपत्रकावर आयोजित करण्यात आलेल्या सभेत विविध अवांतर मुद्द्यांवर चार तास गदारोळ झाला. चर्चेसाठी बजेट पुस्तकाचे पानही उघडले नाही. अवांतर विषयांवर सभेत चर्चा घडली. नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी बजेटवर सवाल उपस्थित करताच नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द काढणाऱ्या छिंदमला सभागृहात बोलण्याचा अधिकार नाही, असे म्हणत गदारोळ घातला. घोषणाबाजी करत छिंदम यांना सभागृहातून बाहेर काढले. दरम्यान, यामुळे काही वेळ सभागृहात तणाव निर्माण झाला होता. महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली तहकूब सभा शुक्रवारी दुपारी सुरू झाली. सुरुवातीपासूनच अवांतर विषयावर चर्चा सुरू झाली. सावेडी गावठाणच्या सिटीसर्वेचा मुद्दा, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, गॅस पाईपलाईनसाठी खोदाई शुल्क, महापालिकेच्या मालकीच्या भूखंडाची परस्पर विक्री, घरपट्टी सर्वेक्षण आदी मुद्द्यांवर नगरसेवकांनी प्रशासनाला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात नगरसेवक छिंदम यांनी बजेटवर चर्चेची मागणी करत आयुक्तांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक होत छिंदम यांना बाहेर काढण्याची मागणी केली. त्यांच्या हातातील बजेटचे पुस्तक हिसकावून घेत त्यांना सभागृहातून बाहेर काढले. त्यांच्या समोरील माईकही हटवण्यात आला. पुढच्या सभेत छिंदम यांना सभागृहातून बाहेर काढण्यासाठी ठराव झाला पाहिजे, त्यासाठी उर्वरित पान ४ माळीवाडा वेस पाडण्याची मागणी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी माळीवाडा वेस पाडण्यात यावी, अशी मागणी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांकडे लेखी निवेदनाद्वारे केली. सर्वांची मागणी असल्याचे नगरसेवक निखिल वारे यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे गटनेते दत्तात्रय कावरे यांनी मात्र, मागणीला विरोध केला. मला बाहेर काढण्यासाठी कट रचला होता : छिंदम मला नागरिकांनी लोकशाही मार्गाने निवडून दिले आहे. सभागृहात बोलण्याचा अधिकार मला आहे. मात्र, मला बोलून द्यायचे नाही, असेच चित्र सुरुवातीपासून तयार केले होते. कट रचून गोंधळ घालून मला बाहेर काढण्यात आले. यामागे आमदार संग्राम जगताप यांचा हात असल्याचा आरोप छिंदम यांनी केला. पोलिसात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हवामान बदल:उन्हाच्या चटक्यानंतर ढगाळ सावली; दोन तासांत 3.2 अंशांनी पारा घसरला
अहिल्यानगर शहरात शुक्रवारी तापमानाचा मोठा लपंडाव पाहायला मिळाला. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पारा ३८.२ अंश सेल्सियसवर होता. मात्र, त्यानंतर अचानक बदललेले ढगाळ वातावरण आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अवघ्या दोन तासांत तापमानात ३.२ अंश सेल्सियसची लक्षणीय घट होऊन सायंकाळी ५:३० ला पारा ३५ अंशांवर आला. दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरात सोसाट्याचा वारा सुटला आणि पावसाचे काही थेंब कोसळले. काही काळ वारा सुटल्याने दिल्ली गेट, नेप्ती नाका, कल्याण रोडसह शहरातील अनेक भागात वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकांसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी तीव्र उष्णतेच्या मे महिन्यात जिल्ह्यात १०५ मिलिमीटर अतिवृष्टीच्या पावसाची नोंद झाली असतानाच यंदा मात्र मार्च महिन्यात दुसऱ्यांदा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पाऊस झाला आहे. शहरात दुपारी चार वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. छाया : मंदार साबळे अवकाळीमुळे गहू, कांदा, हरभरा, मक्याला फटका जिल्ह्यात १९ ते २० मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे ११ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. यात सर्वाधिक गहू, कांदा, हरभरा, मका, भाजीपाला ही पीके भुईसपाट झाली होती. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून त्याचा अहवाल विभागीय आयुक्तालया मार्फत राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
सामाजिक राज्यस्तरीय न्याय व विशेष साहाय्य विभागाचा २०२४-२५ या वर्षीचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते, मानसतज्ज्ञ असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप नवलसिंग सिसोदे यांना पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. १५ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करण्यासाठी गेल्या ५ वर्षांचे पुरस्कार विभागाचे अपर सचिव विवेक शिंदे यांनी जाहीर केला होता. मागील दोन दशकांपासून डॉ. संदीप सिसोदे व्यसनमुक्ती, मानसिक समुपदेशन क्षेत्रात कार्यरत आहेत.
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त श्री श्री राधा मदन गोपाल मंदिर परिसर प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने शुक्रवारी (दि. २७) दुमदुमून गेला. पहाटे ५ वाजता मंगल आरती झाली. श्री श्री राधा मदन गोपालजींसह श्रीराम, लक्ष्मण, जानकी आणि हनुमंताच्या उत्सव विग्रहांना विशेष पीतांबर, मौल्यवान अलंकारांनी विभूषित करण्यात आले. दुपारनंतर ‘हरे कृष्ण' महामंत्राचा आणि राम भजनांचा जयघोष सुरू झाला. टाळ-मृदंगाच्या गजरात भाविक तल्लीन होऊन नाचू लागले. सायंकाळी ७ वाजता मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. प्रभूंच्या विग्रहांना गाईचे दूध, दही, तूप, मध आणि विविध फळांच्या रसाने महाअभिषेक झाला. ‘रामकथेच्या श्रवणाने होते चित्ताचे शुद्धीकरण’: मुंबईहून आलेले इस्कॉनचे जी. बी.सी. सदस्य गौरांग प्रभू यांनी दोन दिवस रामकथा सांगितली. प्रभू श्रीराम हे आदर्श होते. रामकथेच्या श्रवणाने माणसाच्या अंतःकरणातील विकारांचा नाश होऊन चित्ताचे शुद्धीकरण होते, असे प्रतिपादन त्यांनी केले. ^वैष्णव संप्रदायात ज्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नवमी तिथी असते, तोच दिवस रामनवमी उत्सवासाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो. प्रभू रामांचा जन्म दुपारी १२ वाजता झाला. त्यामुळे ज्या दिवशी दुपारी १२ वाजता नवमी तिथी पूर्णपणे अस्तित्वात असते, तोच दिवस जन्मोत्सवासाठी शास्त्रशुद्ध ठरतो. याच नियमांचे पालन करून इस्कॉनमध्ये हा सोहळा झाला. - नरसिंह कृपादास, इस्कॉन
इगतपुरी तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि लायन्स क्लब जुहू यांच्या सामाजिक बांधिलकीतून उभारण्यात आलेली शाळा इमारत हे उल्लेखनीय कार्य आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यास नवी दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार शिवराम झोले यांनी केले. खडकेद येथे लायन्स क्लब जुहूच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनिअर कॉलेजच्या नवीन इमारतीचे उद्घाटन रामनवमीच्या मुहूर्तावर पार पडले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब जुहूचे मनोज बागुल होते. यावेळी अध्यक्ष अक्षय मेहता, केतन मेहता, मुकेश शहा, विरेन काटवाला, नरेश सरवेया यांनी मनोगत व्यक्त करत सामाजिक बांधिलकीतून शिक्षण क्षेत्रात योगदान देत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी माजी आमदार निर्मला गावीत, पांडुरंग गांगड, काशिनाथ मेंगाळ, आदिवासी विकास विभागाचे संचालक देवराम मुंडे, माजी जि.प. सदस्य गोरख बोडके आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. खडकेद येथे मार्गदर्शन करताना माजी आमदार शिवराम झोले व उपस्थित मान्यवर
येथील श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठानतर्फे सामाजिक पातळीवर गौरवास्पद काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा कृष्णाई मंगल कार्यालयात पार पडला. अध्यक्षस्थानी अलका अमृतकार होत्या. या कार्यक्रमास महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमधून पुरस्कारार्थी महिलांची उपस्थिती होती. सात निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना साडीचोळी आणि महिनाभर पुरेल एवढा किराणा श्रीहरी प्रतिष्ठानने दिला. आश्विनी मोरे यांनी साकारलेली महिलांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित रांगोळी दालनाचे उद्घाटन मनिषा गहिवरे व किरण येवले यांनी केले. प्रमुख पाहुणे व पुरस्कारार्थी सुवासिनींनी पुष्पवृष्टी करून गौरव केला. स्नेहलता शरद नेरकर यांनी हार्मोनियमच्या तालावर महिषासूर मर्दिनी स्त्रोत व आरती सादर केली. सात गीतांचे नृत्य सादरीकरणही लक्षवेधी ठरले. उत्कृष्ट काम करणाऱ्या अकरा सावित्रींच्या लेकींना व सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, क्रीडा, आरोग्य इत्यादी क्षेत्रातील आदर्श काम करणाऱ्या बारा जोडप्यांना लक्ष्मीनारायण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे सटाणा नगराध्यक्षा हर्षदा सोनवणे, उज्ज्वला पाचपुते, प्रतिभा वाणी व मीनाक्षी देशमुख उपस्थित राहून सावित्रींच्या लेकींना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ज्योती महालपुरे व स्नेहल पाटील यांनी केले. वैशाली देव, अरुणा नेरकर, छाया पाटकर, सीमा सोनजे, सविता शिरोडे, नीलिमा नेर, रेखा सोनजे, कल्पना अहिरे, योगिता कोठावदे, मंगला येवले, नेहा भदाने, नलिनी इंगळे, गायत्री देसले, धनश्री वाणी, वंदनीय लीलावती, रामराव सावंत, ज्योत्स्ना मोराणकर, सोनाली दुसे, कल्पना येवला, सारिका देसले, शुभदा निकम, अद्वैत उपासनी, आरुषी खुटाडे, सारिका सोनजे, चैताली महालपुरे, आशा शिरोडे, आश्विनी नावरकर
नांदगावी मांस विक्री व कत्तलखाने बंद ठेवावेत:सकल जैन समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन
भगवान महावीर जन्म कल्याणक उत्सव आणि हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मांस विक्री व कत्तलखाने बंद ठेवावेत, अशी मागणी सकल जैन समाजाने प्रशासनाकडे केली आहे. यासाठी तहसीलदार, पोलिस निरीक्षक आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. महावीर जन्म कल्याणक उत्सव, त्यानंतर श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती हे पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरे होणार आहेत. या सणांचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता शहरात शांतता व पावित्र्य राखण्यासाठी सर्व मांस विक्री दुकाने व कत्तलखाने बंद ठेवणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी ओसवाल श्वेतांबर जैन संघाचे अध्यक्ष दत्तराज छाजेड, खंडेलवाल दिगंबर जैन पंचायतचे अध्यक्ष सुमेर कासलीवाल, मंत्री शरद लोहाडे, तसेच प्रतिनिधी सुदेश गंगवाल, ललित काला, पीयूष काला आदी उपस्थित होते. सणांच्या काळात अहिंसा, संयम आणि धार्मिक श्रद्धांचा आदर राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. शहरातील विविध धार्मिक संघटनांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला असून, प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मनोज चव्हाणांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनाा दिलासा:इगतपुरीतील आदिवासीपाड्यांना टँकरद्वारे पाणी
इगतपुरी तालुक्यातील पायरवाडी, झुगरेवाडी आणि खडकवाडी शिवारातील आदिवासी पाड्यांवरील नगरिकांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला आहे. मनसेचे ‘पाणीदूत’ म्हणून ओळख असलेले डॉ. मनोज चव्हाण (रा. मुंबई) यांच्या पुढाकारातून या भागात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. या पाड्यांवरील भीषण परिस्थितीची माहिती मिळताच चव्हाण यांनी समाजसेवक सीताराम गावंडा यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्वरित पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले. यापूर्वी येथील आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर-दऱ्यांमधून जीव धोक्यात घालून पायपीट करावी लागत होती. अनेकांना गढूळ झऱ्यांतील पाणी पिऊन तहान भागवावी लागत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सध्या पायरवाडी, झुगरेवाडी आणि खडकवाडी या तिन्ही पाड्यांवर नियमितपणे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, पावसाळा सुरू होईपर्यंत ही व्यवस्था सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण असून, स्थानिकांनी मनोज चव्हाण, सीताराम गावंडा, शैलेश पुरोहित तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
सम्राट अशोकाचे लोकाभिमुख कार्य, सत्य, अहिंसा, दया आणि क्षमा या मूल्यांचा अवलंब आजही समाजाला प्रेरणा देतो. अशोकाच्या योगदानामुळे जगाला बुद्धांची ओळख मिळाली आणि भारतीय संविधानासह राष्ट्रध्वज, संसद, चलन, राजमुद्रा यासारख्या राष्ट्रीय प्रतिकांवर त्याचा प्रभाव आजही दिसतो, असे प्रतिपादन बौद्ध संस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक अतुल भोसेकर यांनी केले. सटाण्यातील सम्राट अशोक स्तंभावर आयोजित जयंतीनिमित्त व्याख्यानात ते बोलत होते. या महान राजाच्या आदर्शाच्या खुणा भारत देशातील कणाकणात आहेत. संसद, भारताचे चलन, राष्ट्रध्वज, संविधान, राजमुद्रा यांसारख्या राष्ट्राच्या महत्त्वाच्या प्रतिकांवर सम्राट अशोकाचे अस्तित्व आजही अभिमानाने झळकत आहे. भारतीय जनमाणसात शिलालेखांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लेखनकलेची सुरुवात अडीच हजार वर्षांपूर्वी सम्राट अशोकाच्या काळात झाली. भारतात दगडामध्ये साकारलेल्या बहुतांशी बौद्ध लेणी असून, लेखनकलेसोबत चित्रकला, काव्य, रस्ते विकास, आरोग्य सुविधा, तसेच जगातील इतर देशांशी असलेले सौहार्दाचे संबंध अशा सर्वस्पर्शी सम्राट अशोकाच्या इतिहासाचे कौटुंबिक स्तरावर अध्ययन करण्याचे आवाहन भोसेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेशाध्यक्ष के. के बच्छाव होते, तर नगराध्यक्षा हर्षदा पाटील, तहसीलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक योगेश पाटील, सटाणा आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे अदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास कसमादेतील बौद्ध बांधव व प्रियदर्शी सम्राट अशोक कृती समितीचे पदाधिकारी, सदस्य आदींसह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. उपस्थितांनी सम्राट अशोक यांच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्याबद्दल अभिमान व्यक्त केला.
सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथील ग्रामदैवत शहा कलंदर बाबा यांच्या यात्रेला मंगळवारी २४ मार्च रोजी उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सोमवारी रात्री ९ वाजता दादा मिया शहा यांच्या घरापासून बाबांची संदल मिरवणूक निघाली. ढोल-ताशांचा गजर झाला. फटाक्यांची आतषबाजी झाली. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी २५ मार्च रोजी दुपारी बाबांना कबूल केलेला नवस बारागाड्या ओढून, गळ लावून पूर्ण करण्यात आला. काहींनी बोकडाच्या कंदुरीची मेजवानी देऊन नवस पूर्ण केला. बुधवारी रात्री ठीक ९ वाजता गावात दरवर्षीप्रमाणे पारंपरिक मासीचे सोंग काढण्यात आले. सोंग पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली. रात्री ठीक १० वाजता शहा कलंदर बाबा यांचे तयार केलेले बुगारे पेटवून हवेत उडवण्यात आले. रसिकांसाठी लोकनाट्य-तमाशाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. तिसऱ्या दिवशी गुरुवारी २६ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत बाबाच्या दर्ग्यासमोर हाजरीचा कार्यक्रम झाला. दुपारी ३ वाजता गावकऱ्यांच्या वतीने, शहा कलंदर बाबा संस्थानतर्फे यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन झाले. आखाड्यासाठी १ रुपयापासून ७०५१ रुपयांपर्यंत बक्षीस ठेवण्यात आले. आखाड्यात १ रुपयापासून अंदाजे ६० हजार रुपयांपर्यंत बक्षिसांचे वाटप मल्लांना झाले. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत अनेक कुस्त्या झाल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, सोयगाव तालुक्यांतून मल्ल आले. जालना जिल्ह्यातूनही मल्ल आले. आखाडा पाहण्यासाठी अंदाजे चार ते साडेचार हजार कुस्तीप्रेमी उपस्थित होते. बनकिन्होळा, परिसरातील कुस्तीपटूंनी आखाडा गाजवला. आखाडा यशस्वी करण्यासाठी माजी पोलिस पाटील पांडुरंग माऊली फरकाडे, एकनाथ फरकाडे, प्रल्हाद फरकाडे, ज्ञानेश्वर दामले, संतोष फरकाडे, सचिन जाधव, भाऊसाहेब फरकाडे आदींनी परिश्रम घेतले. दोघांना समान बक्षीस; हलगी वाजवत गावातून मिरवणूक बनकिन्होळ्याचा पांडुरंग फरकाडे, कानडगावचा शिवा सोनवणे यांच्यात ७०५१ रुपयांची शेवटची कुस्ती झाली. यात कोणीही पडले नाही. दोघांना समान बक्षीस देण्यात आले. शेवटच्या कुस्तीचा मानकरी पांडुरंग फरकाडे यांची गावातून मिरवणूक काढली.
सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देखील अनेक पेट्रोल पंपांवर ‘नो पेट्रोलचे बोर्ड’ लागलेले होते. ज्या पंपांवर डिझेल- पेट्रोल मिळत होते, तेथे वाहनधारकांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. पेट्रोल-डिझेलविषयी कुणी अफवा पसरवली तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार ज्योती पवार यांनी दिला आहे, तर शेतीमधील वाढत्या दरांमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता डिझेल उपलब्ध होत नसल्याने ऐन पीक काढणीच्या वेळी संकटांना सामोरे जावे लागत आहे. आखाती देशांतील युद्धाचा जिल्ह्यातील नागरिकांनाही फटका बसला आहे. गॅसपाठोपाठ पैठण तालुक्यात पेट्रोल-डिझेलसाठी देखील पंपांवर वाहनधारकांच्या लांबच- लांब रांगा गुरुवारी (दि. २६) लागल्याचे आढळून आले. तीच परिस्थिती आज, शुक्रवारी देखील पाहायला मिळाली. अफवेमुळे अनेकांनी जास्तीचे पेट्रोल- डिझेलची खरेदी केली. तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वच पंपांवर शुक्रवारी देखील ‘नो पेट्रोल, डिझेलचे’ फलक लागलेले होते. ग्रामीण भागातील पंपांवर पेट्रोल नसल्याने पैठण शहरात दुसऱ्या दिवशी देखील वाहनधाराकांची पंपांवर गर्दी दिसून आली. तालुक्यातील अनेक पंपांवर डिझेल नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गहू व इतर पिकांची काढणी वेळेत करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. अवकाळी पावसाची शक्यता असताना डिझेल टंचाई निर्माण झाल्याने अडचण वाढली आहे. बदलत्या काळानुसार शेतीत मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाले आहे. बैलजोडीऐवजी ट्रॅक्टर, पंपसेट, फवारणी यंत्रे, गहू काढणीची यंत्रे यांचा वापर वाढला आहे. नांगरणी, पेरणी, कोळपणी, फवारणी, वाहतूक ही कामे डिझेलवर चालणाऱ्या यंत्रांवर अवलंबून आहेत. इंधन टंचाईमुळे शेतीची साखळी विस्कळीत होत आहे. पैठणमध्ये पंपांवर गुरूवारी दुचाकीधारकांच्या अशा रांगा लागल्या होत्या. पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांमधून मागणी “गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाल्याने शेती कामे अडली आहेत. खर्च वाढला आहे. उत्पन्न कमी झाले आहे. शेतीचा ताळमेळ लागत नाही,” अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते माऊली मुळे यांनी दिली. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेलवरील कर कमी करावा. ग्रामीण भागात इंधनाचा सुरळीत पुरवठा करावा. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, असे तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी सांगितले.

28 C