साताऱ्यातील सावरी येथे उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा पोलीस प्रशासनावर आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ड्रग्ज रॅकेटमधील आरोपी ओंकार डिघे घटनास्थळी सापडला असतानाही त्याला का सोडून देण्यात आले? एमएच ११ पासिंगच्या पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा गाडीतून त्याला कोणी जाऊ दिले? असे तिखट सवाल उपस्थित करत अंधारे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. तसेच, घटनास्थळी पुन्हा सापडलेल्या ४० लिटरच्या कॅनवरून सावरी भागात अजूनही ड्रग्ज फॅक्टरी सुरू असावी, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंधारे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले. त्या म्हणाल्या, ओंकार डिघे हा स्पॉटवर असताना त्याला अटक का झाली नाही? तो नंतर रात्री उशिरा स्वतःहून मुंबईच्या युनिट नंबर ७ कडे हजर होतो, हे संशयास्पद आहे. याचा अर्थ, सत्ताधाऱ्यांशी संबंधित लोकांना पोलीस अटक करत नाहीत, तर ते स्वतःच्या सोयीने हजर होतात. वाल्मीक कराड, प्रशांत कोरटकर ही याचीच उदाहरणे आहेत. ४० लिटर लिक्विडचे रहस्य पोलीस तपासातील हलगर्जीपणा उघड करताना अंधारे यांनी सावरी येथील घटनाक्रमाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, काल आमची पत्रकार परिषद आटोपल्यानंतर अवघ्या दोन तासांत सातारा पोलिस सावरीला पोहोचले होते. त्यांच्या पाठोपाठ एक वृत्तवाहिनी पोहोचली. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्याला विचारले असता, आमच्याकडे काही तपास नाही, मी सहज आलो असे सांगितले जाते. जर सातारा पोलिसांकडे तपास नाही, तर इतक्या तत्परतेने सातारा पोलिस तिकडे का पोहोचले? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. पोलिसांनी तिथे काहीतरी सामान उचचले, तर त्याचा काही गैरवापर होऊ नये, यासाठी ते उचलल्याचे पोलिस सांगतात. दार उघडल्यानंतर आत एक चाळीस लीटर निळ्या रंगाची कॅन दिसते. याबाबत पोलिसांना विचारले असता, ते म्हणतात की, हे राहिलेले सामान होते, चुकून राहिले असेल. जर सावरीला एवढी मोठी कारवाई झाली होती, तर ती कॅन चुकून कशी राहील? आणि जर चुकून राहिली असेल, तर हा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा आहे. गृहमंत्र्यांनी अशा अधिकाऱ्यांची ताबडतोब चौकशी लावली पाहिजे. एवढे मोठे लिक्वीड चुकून कसे राहील?असेही सुषमा अंधारे म्हणाल्या. फॅक्टरी अजूनही सुरू? पोलिसांनी आधी सर्व परिसर 'क्लिन' केला होता, मग आता अचानक तिथे पुन्हा कॅन कसा सापडतो? यावर बोट ठेवत अंधारे यांनी गंभीर शंका उपस्थित केली. याचा दुसरा अर्थ असा होतो की, त्या भागात अजूनही फॅक्टरी सुरू आहे किंवा ड्रग्ज माफियांचा वावर तिथे आहे, असा आरोप त्यांनी केला.
हिंगोली जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होत आहे. काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिकृत स्वरूप मिळालं आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असून, हिंगोलीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज त्यांनी विधानभवन सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला असून, आजच त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या घडामोडीमुळे काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. या पक्षांतरामागे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. मात्र, अशोक चव्हाण यांनी या आरोपांचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. एका वृत्तवाहिणीशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशात माझा कोणताही संबंध नाही. माझा आणि त्यांचा अनेक दिवसांपासून संपर्कही नाही. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सद्यस्थितीवरही गंभीर टिप्पणी करत म्हटले की, अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांना काँग्रेसमध्ये आपले भवितव्य सुरक्षित वाटत नाही. पक्षातील नेतृत्व कमकुवत झालं असून, मेहनत करणारे कार्यकर्ते डावलले जातात आणि त्यामुळेच अंतर्गत असंतोष वाढतो आहे. स्थानिक पातळीवर पर्याय शिल्लक राहत नसल्याने अशा निर्णयांना चालना मिळते, अशी खंतही चव्हाण यांनी व्यक्त केली. दरम्यान, डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदारकीचा औपचारिक राजीनामा दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदावरही होत्या. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर 2021 साली त्या विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024 मध्ये काँग्रेसकडून त्या दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्या होत्या आणि त्यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत होता. मात्र, आता अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विशेषतः हिंगोलीसारख्या जिल्ह्यात जिथे काँग्रेसचा प्रभाव मानला जात होता, तिथे या पक्षांतरामुळे भाजप अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजीव सातव हे गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे डॉ. प्रज्ञा सातव या दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जात होते आणि त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. 2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रातून काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते, त्यात राजीव सातव यांचा समावेश होता. त्यांनी पंचायत समिती सदस्य ते राज्यसभा खासदार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस आणि काँग्रेस कार्य समिती सदस्य अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. त्यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांनी राजकारणात प्रवेश करत काँग्रेसमध्ये सक्रिय भूमिका घेतली. मात्र आता त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेससाठी हा केवळ एक पक्षांतराचा विषय न राहता, नेतृत्व, विश्वास आणि भवितव्याच्या प्रश्नावर मोठं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आल्याचं राजकीय विश्लेषक मानतात.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माणिक मोती गळाले असा उल्लेख करत त्यांनी सत्ताधारी मंत्रिमंडळावर टीकेची झोड उठवली. महायुतीतील दोन घटक पक्षांना इशारा देत राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टप्प्याटप्प्याने राजकीय खेळी खेळत असून शेवटी त्याचा फटका शिंदे गटालाच बसेल. पुढे शिंदेंचा पक्ष अस्तित्वात राहील का? असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत संघर्ष उघड केला. फडणवीस हे राजकारणात दीर्घ खेळ खेळतात आणि अखेरचा घाव हा मिंध्यांवरच घालतील, असा टोला राऊतांनी लगावला. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मोठा दावा केला. आपण आज शरद पवार यांची भेट घेणार असून आघाडीबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्याशी संवाद सुरू असून काँग्रेसकडूनही सकारात्मक संदेश आल्याचे राऊत म्हणाले. मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधूंचाच असेल आणि तो अस्सल मराठी माणूस असेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकांमध्ये मुंबईवर ठाकरे गटाचाच झेंडा फडकणार, असा आत्मविश्वास दाखवत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले. धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यावरही संजय राऊतांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. वाल्मिक कराड अजूनही तुरुंगात असून प्रकरणाचा खटला पूर्ण झालेला नाही, अशा परिस्थितीत गंभीर आरोप असलेल्या व्यक्तींना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देणे हे पाप ठरेल, असे त्यांनी म्हटले. भ्रष्टाचार आणि गुंडगर्दीच्या आरोपांमुळे फडणवीस मंत्रिमंडळातील एकाच गटाचे दोन मंत्री गेले, हीच या सरकारवर लागलेली मोठी काळीमा असल्याचे त्यांनी नमूद केले. शिंदे गटात असे अनेक मंत्री असल्याचा दावा करत त्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली. पैशांच्या बॅगा, संशयास्पद व्यवहार आणि इतर गंभीर मुद्दे सर्वांना दिसत असतानाही सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राऊतांनी केला. माणिकराव कोकाटे प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी सरकारवर थेट संरक्षण दिल्याचा आरोप केला. कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत सुरू असून त्यातून आम्ही भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी आहोत, असा संदेश दिला जात असल्याचे ते म्हणाले. आमदार, खासदार किंवा मंत्री कोणीही भ्रष्ट असेल तर त्यांनी आमच्याकडे यावे, पूर्ण संरक्षण दिले जाईल, असा संकेत सत्ताधारी देत असल्याचा आरोप त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर अमित शहा आणि धनंजय मुंडे यांची भेट ही देखील याच संदेशाचा भाग असल्याचा दावा राऊतांनी केला. महाराष्ट्रात हा संदेश देवेंद्र फडणवीस देत असून दिल्लीतून अमित शहा तोच सूर आळवत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीतील घटक पक्षत काँग्रेसच्या मनसेला सामावून घ्यायचे की नाही या भूमिकेमुळे प्रतीक्षेत आहेत. असे असली तरी मनसे, उद्धवसेनेकडून आपापली तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने इच्छुकांकडून मुलाखतीसाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यात ‘खर्च किती करणार’ अशी थेट विचारणाच केली आहे. तर मनसेनेही मुलाखत अर्ज विक्री सुरू केली आहे. इच्छुकाला १ अर्ज तब्बल ५००० रुपयांना विकला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात अद्यापही काही हालचाल दिसून येत नाही. पक्ष कार्यालयात कोणीही दिसून येत नाहीत. तशीच काहीशी परिस्थिती काँग्रेसची आहे. काँग्रेसच्या कार्यालयातही शुकशुकाट दिसून येत आहे. पुढील दोन-चार दिवसांत आघडाचा तिढा सुटेल असे स्थानिक नेते सांगत आहेत. उबाठा : अर्जावरच खर्च लिहिण्याची अट नाशिक | इच्छुकांसाठी अर्जावर माहिती भरताना ठळक अट म्हणजे ‘मी निवडणुकीच्या कामासाठी किती खर्च करणार आहे, याची रक्कम स्पष्टपणे लिहावी लागते आहे. तसेच वरीष्ठ नेत्यांकडून इच्छुकांना तशी विचारणाही केली जात आहे. इलेक्शन कमिशनने १५ लाखांची मर्यादा दिली आहे. मात्र इच्छुकांना त्याची माहिती नसल्याने ते २० लाख, २५ लाख, खूप खर्च करु वगैरे असे त्या अर्जांमध्ये नोंदवत असल्याचे दिसते आहे. सच्च्या कार्यकर्त्यांना संधीसाठी प्रभागात ताकद, खर्चाची तयारी या दृष्टीने निवड होणार आहे. - वसंत गिते, उपनेते मनसे : मुलाखत अर्ज किंमतच ५००० रु. नाशिक | मनसेत ३०० इच्छुकांनी मुलाखतीचे अर्ज घेतले असून एका अर्जाची किंमत ५००० रु. आहे. मनसे व उद्धवसेनेची बैठक झाली असून यात ५० - ५० टक्के जागांवर निवडणूक लढण्यावर चर्चा करण्यात आली. तसेच इच्छुकांची आर्थिक व प्रभागातील ताकद बघुनच उमेदवारी देण्यात येण्यावरही विचार झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकिला दिनकर पाटील, सलीम शेख उपस्थित होते. गुरुवारी (दि. १८) मुंबईत राज ठाकरे यांना इच्छुकांची यादी सादर केली जाणार आहे. - दिनकर पाटील, सरचिटणीस काँग्रेस : आघाडीचे समीकरण काही सुटेना नाशिक | मविआच्या सर्व घटकपक्षांनी इच्छुकांच्या मुलाखतींसाठी तयारी केलेली असताना शहर काँग्रेसमध्ये मात्र अद्यापही शुकशुकाटच दिसतो आहे. मनसेला आघाडीत घ्यायचे वा नाही या चर्चेच्या घोळाचे समीकरण अद्यापही सुटताना दिसत नाही, कोणतीही रणनीती, बैठका किंवा प्रचाराची सुरुवात न झाल्याने पक्षातील इच्छुक उमेदवार, पदाधिकारी संभ्रमात आहेत. वरीष्ठांकडून निवडणुकीसंदर्भात संदेश येण्याच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. २ दिवसांत निणर्य होईल.- पदाधिकारी, काँग्रेस राष्ट्रवादी (अप) : खर्चाचे गणित इच्छुकांना विचारले नाशिक | विजयाचे गणित सांगा? निवडून कसे येणार अन् तिकीट का द्यावे असे प्रश्न इच्छुकांना विचारुन राष्ट्रवादी (अप)ने आर्थिक स्थितीही पडताळून बघितली. संपूर्ण १२२ जागांवर लढण्याची तयारी ठेवत पक्षाने बुधवारी (दि. १७) २११ जणांच्या मुलाखती घेतल्या. त्याचवेळी जिथे ४ च्या पॅनलसाठी शोधाशोध होणार आहे तेथे चाचपणी करताना इच्छुकांनाही सूचना केल्या. समीर भुजबळ, रंजन ठाकरे यांनी मुलाखती घेतल्या. महायुतीत सहभागाचे वरीष्ठ पातळीवर ठरेलच सध्यातरी १२२ जागा लढण्याची तयारी- समीर भुजबळ, माजी खासदार
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांनी आज आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्या आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. प्रज्ञा सातव या गत काही महिन्यांपासून सातत्याने काँग्रेसवर नाराज होत्या. त्यामुळे त्या काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानुसार, त्यांनी आज सकाळीच त्यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला. प्रज्ञा सातव यांचे पती राजीव सातव हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा काँग्रेससाठी जबर झटका असल्याचे मानले जात आहे. प्रज्ञा सातव आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी त्यांचे कार्यकर्ते हिंगोलीहून मुंबईला पोहोचलेत. प्रज्ञा सातव यांनी का घेतला टोकाचा निर्णय? राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू झाला होता. विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी डॉ. प्रज्ञा सातव यांचे नाव चर्चेत असताना हिंगोलीच्या तत्कालीन पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी त्यांना डावलून इतर नावांना पसंती दिली होती. त्यावरून डॉ. सातव व वर्षा गायकवाड यांच्यात कथित वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाही. यामुळे पक्षाच्या बैठकांत गटबाजी उफाळून आली होती. काँग्रेसच्या नेत्यांकडूनच पक्षात समन्वय साधण्यासाठी प्रयत्न झाले नसल्याने अखेर डॉ. सातव यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली असा दावा केला जात आहे. हिंगोलीच्या राजकारणावर किती पडणार फरक? डॉ. प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशाने हिंगोली जिल्ह्यातील राजकारणावर मोठा असा परिणाम होणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र कळमनुरी तालुक्यात भाजपाला काही प्रमाणात बळ मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गत 4 महिन्यांत हिंगोलीत मोठी उलथापालथ उल्लेखनीय बाब म्हणजे हिंगोली जिल्ह्यात मागील 4 महिन्यांत मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिंदेसेनेला सेनगाव व हिंगोली तालु्क्यात मोठे बळ मिळाले. त्यानंतर पालिका निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) काही माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. या शिवाय शरद पवार गटाचेच जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह माजी नगरसेवकांनीही नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोण आहेत प्रज्ञा सातव? डॉक्टर प्रज्ञा सातव या काँग्रेस दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव 2014 ते 2019 या कालावधीत हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे म्हणून त्यांची ख्याती होती. पण 2021 मध्ये आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. त्यानंतर प्रज्ञा सातव राजकारणात आल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. सध्या त्या महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणून काम करत आहेत. तत्पूर्वी, 2021 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही त्या विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ 2030 मध्ये संपणार आहे. कोण होते राजीव सातव? राजीव सातव राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. 2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे केवळ 2 खासदार निवडून आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा समावेश होता. त्यामुळे राजीव सातव प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर राजीव सातव यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या आणि पदे भूषवली होती.
छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेल (धनदा कॉर्पोरेशन) गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने एक हाय पॉवर समिती नियुक्त केली आहे. ही समिती या संपूर्ण प्रकरणाचा 8 दिवसांच्या आत तपास करून आपला अहवाल सादर करणार आहे. परिणामी, या प्रकरणी अडचणीत आलेल्या मंत्री संजय शिरसाट यांचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या समितीच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील 110 कोटींचे सुप्रसिद्ध हॉटेल व्हिट्स अवघ्या 68 कोटींत खरेदी करण्याचा कथित प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर शिरसाट यांनी या सौद्यातून काढता पाय घेतला. पण आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमल्यामुळे मंत्री शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सरकारच्या परिपत्रकानुसार, प्रस्तुत समिती धनदा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालमत्तेच्या लिलावामध्ये निविदा प्रक्रिया राबवताना त्यामधील अटी, शर्ती किंवा इतर प्रक्रियेत कुठे अनियमितता झाली आहे काय? याबाबत व सदर मालमत्तेच्या मूल्यांकनाबाबत सखोल चौकशी करणार आहे. समितीत कुणाचा समावेश? छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील या समितीत संभाजीनगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, सहसंचालक लेखा व कोषागारे, उपायुक्त कामगार विभाग, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, सह जिल्हा निबंधक, सहाय्यक संचालक नगर रचना विभाग आदींचा सदस्य म्हणून समावेश आहे. या व्यतिरिक्त समिती अध्यक्षांना जे अधिकारी सदर समितीत आवश्यक वाटतील त्यांची नियुक्ती करण्याचे अधिकारही देण्यात आलेत. सदर समितीला धनदा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालमत्तेच्या लिलावात निविदा प्रक्रिया राबवताना त्यामधील अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झाली आहे काय? याबाबत व सदर मालमत्तेच्या मूल्यांकनाबाबत सखोल चौकशी अहवाल समितीच्या शिफारशी व अभिप्रायांसह तसेच आवश्यक कागदपत्रांसह 8 दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश दिलेत. या पत्रकावर छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांची स्वाक्षरी आहे. सरकारचा प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न - दानवे दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी या समितीवरून सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, ज्या कार्यालयातुन विट्स हॉटेल (धनदा कॉर्पोरेशन) गैरव्यव्हार प्रकरणाच्या फाईली फिरल्या, त्याच कार्यालयांचे अधिकारीच आता या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचा आदेश निघाला आहे. ही कसली 'हाय पॉवर कमिटी' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी? हे तर प्रकरणावर स्पष्टपणे पांघरूण घालणे झाले! वरिष्ठ, सचिव पदाचे सनदी अधिकारी किंवा न्यायाधीश या समितीचे अध्यक्ष आणि जिल्ह्याबाहेरील अधिकारी समितीवर नेमले असते तर आपल्यातील न्यायप्रिय मुख्यमंत्री दिसला असता. आता ही समिती निव्वळ देखावा आहे, असे ते म्हणालेत. नेमके काय आहे प्रकरण? छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याचा आरोप मंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री शिरसाट यांच्यावर हे हॉटेल कमी किंमतीत विकण्यासाठी संबंधितांवर दबाव टाकल्याचा आरोप केला होता. तसेच हे हॉटेल खरेदी करण्यासाठी शिरसाट यांच्याकडे पैसे आले कुठून? असाही सवाल त्यांनी केला होता. या आरोपांनंतर संजय शिरसाट यांनी लिलाव प्रक्रियेतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वेग घेताना दिसत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडनंतर आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्व पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांबाबत मुंबईत नवी राजकीय समीकरणं आकाराला येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादीला अपेक्षित जागावाटप मिळण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत असून, भाजप आणि शिवसेनेकडूनही राष्ट्रवादीला सामावून घेण्याबाबत फारसा उत्साह नसल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादी स्वतंत्र मार्ग किंवा पर्यायी आघाडीच्या शक्यता तपासत असल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुंबईतील निवडणुकीसाठी महत्त्वाचा राजकीय संकेत दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बुधवारी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात शहर व प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देण्याचे निर्देश दिल्याचे समजते. महायुतीमध्ये अडचणी वाढत असताना, मुंबईत एकत्र येण्याचा पर्याय राष्ट्रवादीकडून गांभीर्याने विचारात घेतला जात असल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होते. जर हा प्रस्ताव पुढे प्रत्यक्षात आला, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडनंतर मुंबईतही दोन राष्ट्रवादी पक्ष एकत्र निवडणूक लढवताना दिसू शकतात. मात्र, या समीकरणाला दुसरी बाजूही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेसोबत आघाडी करून निवडणूक लढवण्यास अधिक इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शरद पवार गट नेमका कोणता मार्ग स्वीकारतो, यावर मुंबईतील अंतिम चित्र अवलंबून राहणार आहे. दरम्यान, मुंबईत राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची ठरत आहेत. एकीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत जाण्याची शक्यता तपासत आहे. नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपकडून माघार येण्याची शक्यता कमी असल्याने राष्ट्रवादीसाठी महायुतीतील मार्ग अधिक कठीण झाला आहे. तसेच, मुंबईतील अल्पसंख्यांक मतांचा विचार करता नवाब मलिक हे राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचे मानले जात असल्याने पक्षाकडून इतर पर्यायांचीही चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे सुरू असलेल्या बैठकीत राष्ट्रवादीकडून विविध राजकीय शक्यतांवर चर्चा केली जात आहे. महायुतीसोबत राहायचे, स्वबळावर लढायचे की शरद पवार गटासोबत एकत्र यायचे, याबाबत अंतिम निर्णय अजून झालेला नाही. मात्र, मुंबईतील बदलती राजकीय गणिते पाहता राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार असून, येत्या काही दिवसांत या संदर्भात मोठा राजकीय निर्णय जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना शिंदे गट महायुती म्हणून लढवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले असून, या संदर्भात आज पुण्यात दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ आणि शहराध्यक्ष गणेश बिडकर सहभागी होणार आहेत. तर शिंदे गटाकडून उद्योगमंत्री उदय सामंत, उपनेत्या निलम गोऱ्हे, माजी आमदार विजय शिवतारे आणि संपर्कप्रमुख नाना भानगीरे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जागावाटप, प्रचार रणनीती आणि युतीतील समन्वय यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या महत्त्वाच्या बैठकीतून शिंदे गटाचे पुणे महानगरप्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना डावलण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप नेत्यांच्या विरोधामुळे शिंदे गटाकडून धंगेकरांना निर्णय प्रक्रियेतून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी धंगेकरांनी पुणे महापालिकेतील सर्व 165 जागा शिवसेना स्वबळावर लढवण्याची तयारी असल्याचा दावा केला होता. मात्र आता याच बैठकीत भाजपला 35 ते 40 जागा देण्याचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याने धंगेकरांच्या भूमिकेला छेद गेला आहे. पुणे जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणात त्यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधार मोहोळ यांच्यावर केलेले आरोपही आता त्यांच्या अडचणी वाढवणारे ठरत असल्याची चर्चा आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला असून, सत्ताधारी आणि विरोधकांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. पुणे महापालिका निवडणूक महायुतीसाठी प्रतिष्ठेची ठरणार असल्याने भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बैठकीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही - रवींद्र धंगेकर या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया देताना, बैठकीबाबत आपल्याला कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. माध्यमांमधूनच याबाबत कळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिवसभरात निमंत्रण येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असून, आज शिवसेनेच्या मुलाखती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीनंतर नेमके काय चित्र स्पष्ट होते, हे पाहावे लागेल, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. घराणेशाही आणि सत्तेच्या दबावावरून राजकीय वाद दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेतही राजकीय घडामोडींना वेग आला असून, घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला आहे. विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे विश्वासू अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ यंदा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मात्र, ज्या प्रभागात ते वास्तव्यास आहेत ती जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव असल्याने सिद्धार्थला इतर प्रभागातून उमेदवारी घ्यावी लागणार आहे. यासाठी दुसऱ्या प्रभागात अतिक्रमण करून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याची चर्चा आहे. अण्णा बनसोडे यांनी सिद्धार्थ शंभर टक्के निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले असून, कोणत्या प्रभागातून हे अद्याप जाहीर केलेले नाही. यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये घराणेशाही आणि सत्तेच्या दबावावरून राजकीय वाद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
वसमत तालुक्यातील हापसापूर येथे ९९ हजार रुपयांचे कर्ज व नापिकीमुळे तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. १७ अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील हापसापूर येथील नरहरी सवंडकर (४०) यांचे हापसापूर शिवारात दोन एकर शेत आहे.या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. घरी पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सध्या शेतामध्ये गहू व काही क्षेत्रावर ऊसाचे पिक आहे. या शेतीवर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून ९९ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यान, खरीप हंगामात घेण्यात आलेले पिक अतिवृष्टीमुळे हातचे गेले आहे. त्यामुळे आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा तसेच पिककर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. नापिकी व कर्जफेडीची बाब त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह भावांनाही बोलून दाखवली होती. त्यानंतर शनिवारी ता. १३ दुपारी घरी कोणी नसतांना त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. काही वेळानंतर त्यांचे कुटुंबिय बाहेरून घरी आले असतांना नरहरी यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. ्त्यांनी आरडा ओरड करून मदत मागितली. शेजारी तातडीने घटनास्थळी धावले. तर या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, जमादार सुर्यवंशी यांच्या पथकाने घटनास्थळी भेट घेतली. पोलिस व गावकऱ्यांनी नरहरी यांना तातडीने टेंभूर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. या प्रकरणी साहेबराव सवंडकर यांच्या माहितीवरून हट्टा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जमादार सुर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.
सूतगिरणी चौकातील कार-ऑटो अपघातातील जखमीला मदत करण्यासाठी गेलेले माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांना मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी (17 डिसेंबर) रात्री अकराच्या सुमारास घडला. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण होते. सूतगिरणी चौकात कार आणि ऑटोरिक्षाचालकाचा रात्री साडेदहाच्या सुमारास अपघात झाला. अपघातात रिक्षातील एका व्यक्तीला मार लागला होता. त्या वेळी तेथून जात असलेले माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी अपघातस्थळी जखमींना मदत करण्यासाठी धावले. जखमी प्रवाशाला उपचारासाठी नेत असताना एका अज्ञात व्यक्तीने हातातील लोखंडी कडे मारत धक्काबुक्की केली. त्या वेळी तेथे जमाव जमला, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. याबाबत सुरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, आम्ही या अपघातात जखमीला मदत करत असताना काहीही संबंध नसलेली व्यक्ती अचानक आली आणि तिने गोंधळ घातला. या व्यक्तीला जवाहरनगर ठाण्यात आणले होते. या प्रकाराची माहिती समजल्यानंतर भाजपचे नेते दिलीप थोरात, विकास कुलकर्णी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. संबंधित व्यक्तीचे नातेवाईकही जमा होऊन शिवीगाळ करत होते. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर रात्री उशिरा जवाहरनगर पोलिस ठाण्यात आले.
भाजपतील नाराज नेत्यांकडून तिसऱ्या विकास आघाडीचे संकेत:डोकेदुखी वाढणार, की पेल्यातील वादळ शमणार
महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले असतानाच, निवडणुकीच्या निमित्ताने भाजपतील नाराजांनी वेगळी मोट बांधून उभारलेला नागरिक मंच अकोल्याच्या राजकारणाला नवी दिशा देणार, भाजपची डोकेदुखी वाढवणार की पक्षावर दबावतंत्राचे माध्यम ठरणार, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. शिस्तभंगाची कारवाई झालेल्या माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदानी, भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते डॉ. अशोक आेळंबे या शहरातील दोन मातब्बर नेत्यांसह पक्षातील नाराज आजी- माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘नागरिक संवाद मंच’च्या बैठकीत भाजपतील नाराजांनी वेगळी मोट बांधली आणि महापालिकेत तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर भाजपने शिस्तभंगाची कारवाई केलेल्या नेत्यांसह पक्षाच्या नाराज गटावर टीकेची झोड उठवली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते व तब्बल ३० वर्षे नगरसेवक राहिलेले हरीश अलीमचंदानी यांनी पक्षाला रामराम ठोकत निवडणूक लढवली. तसेच भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक ओळंबे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून भाजपविरोधात निवडणूक लढवली. या दोन्ही बंडखोर उमेदवारांमुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले आणि त्याचा थेट फटका भाजपला बसला. अखेर भाजपला या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला होता. या दोघांचे संबंधित प्रभागातील वर्चस्व पाहता जर हे सर्व नाराज नेते आणि कार्यकर्ते प्रत्यक्षात एकत्र आले, तर भाजपची डोकेदुखी निश्चितच वाढणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यात पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची घरवापसी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र अकोल्यात हा घरवापसीचा पॅटर्न अपयशी ठरताना दिसत आहे. उलट, हा अपवादच पक्षासाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. नवे राजकीय समीकरणासाठी नाराजांनी शहरातील बंधन लॉनवर मंगळवारी सायंकाळी नागरिक संवाद घेऊन तिसऱ्या आघाडीची मोट बांधली. यावेळी हरीश अलीमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे, माजी नगरसेवक गिरीश गोखले, आशिष पवित्रकार, हरिभाऊ काळे, चोटमल सारडा, पांडुरंग काळणे, विठ्ठलराव गाढे, मधुकर रगडे आणि प्रा. गणेश बोरकर आदी उपस्थित होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या अकोला पश्चिम मतदारसंघातील पराभवानंतर भाजपने पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत अनेक आजी- माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला. शिस्तभंग कारवाईनंतर त्यांनी ‘नागरिक संवाद मंच’ची स्थापना केली. या संवादातून अप्रत्यक्षपणे भाजपला थेट आव्हान देण्यात आल्याचे चित्र आहे. कारण या नाराज गटाकडे हिंदुत्ववादी एकगठ्ठा मते आहेत. त्याचा फटका भाजपच्या उमेदवारांना बसू शकतो. त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघात झालेली चूक पुन्हा होऊ नये, या दृष्टीने भाजपचे वरिष्ठ नेते भाजपमधील नाराज बंडोबांना थंड करण्यासाठी कोणते तंत्र वापरतात, याकडे लक्ष लागले आहे. विधानसभेची चूक टाळण्यासाठी भाजपचे प्रयत्न?
आजच्या संगणकीय व आभासी जगतात कुटुंबाचा एकता विस्कळीत होऊन दुरावा निर्माण होत आहे. तसेच पूर्वीपेक्षा आजच्या महिलांचे प्रश्नही वेगळ्या पद्धतीचे होत आहेत अशा दुरावलेल्या परिस्थितीत कुटुंबाच्या संयुक्त पद्धतीची आज खरी गरज असून, मातृशक्तीने यावर चिंतन करणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वर्धा येथील ज्येष्ठ समाजसेवी डॉ. शुभदा जाजू यांनी केले. माहेश्वरी वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठच्या वतीने रजत जयंती पर्वावर माहेश्वरी भवनात आयोजित दोन दिवसीय वार्षिक स्नेहमिलन व भगवान रंगनाथजी व देवी गोदाजी विवाह झाकी सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ‘बहुबेटी’ संमेलनात डॉ. जाजू मार्गदर्शन करत होत्या. माहेश्वरी महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष लीला सोमानी यांच्या उपस्थितीत आयोजित या सोहळ्यात वरिष्ठ महिला प्रकोष्ठच्या प्रकल्प प्रमुख शकुंतला चांडक, संयोजिका राजकुवर लढ्ढा, स्वागताध्यक्ष सुशीला गांधी, कार्याध्यक्ष प्रमिला लाहोटी, कार्य सचिव वीणा राठी, मार्गदर्शक डॉ. सरोज राठी, सरोज लढ्ढा, उपाध्यक्ष अरुणा लढ्ढा, सहसचिव शोभा कासट, सुनंदा सोमानी, कोषाध्यक्ष शशिकला खटोड, माहेश्वरी वरिष्ठ नागरिक प्रकाशचे अध्यक्ष सुरेश माहेश्वरी, माहेश्वरी समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष शांतीलाल बाला महिला मंडळ अध्यक्षा वंदना हेडा आदी उपस्थित होते. सर्वप्रथम भगवान महेश यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने या सोहळ्याचा रंगारंग प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रकोष्ठच्या वतीने डॉ. शुभदा जाजू, लीला सोमानी आदींचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्रकोष्ठच्या अध्यक्ष प्रमिला लाहोटी यांनी करून प्रकोष्ठच्या उपक्रमांची माहिती सादर केली. तर सचिव वीणा राठी यांनी लेखाजोखा सादर केला. अतिथी परिचय शोभा कासट तथा ज्योत्स्ना तापडिया यांनी सादर केला. कार्यक्रमात अनेक ‘बहू बेटी’ ने रंगारंग सादरीकरण करत जल्लोष निर्माण केला. या कार्यक्रमात मानवी जीवनातील बाल्यावस्था, युवावस्था व वृद्धावस्था यांचा सुरेख संगम साकार करण्यात आला. यात शशिकला खटोड, राजकुमार लढ्ढा यांनी सहभाग घेतला. तर वीणा राठी यांनी खट्याळ मुलाचा एकपात्री अभिनय सादर केला. शांताबाई राठी यांच्या स्मृतीत राठी परिवार व स्व. भिकुलाल लोहिया यांच्या स्मृतीत उर्मिला राठी, रेखा राठी तथा मंजूश्री लोहिया यांच्या उपस्थितीत सहभागी ‘बहू बेटी’च्या पुरस्कार वितरणाने या प्रथम दिवसाचा समारोप करण्यात आला. शशिकला खटोड यांनी आभार मानले. वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठ, माहेश्वरी सम्राट ट्रस्ट, माहेश्वरी वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ, माहेश्वरी महिला मंडळ, माहेश्वरी प्रगती मंडळ, नवयुवती मंडळाच्या समस्त पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले. भगवान रंगनाथजी, देवी गोदाजी यांचा विवाह सोहळा बुधवारी माहेश्वरी भवनात दुपारी महिलांच्या रंगारंग कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी झालेल्या भगवान रंगनाथजी व देवी गोदाजी विवाह सोहळ्यात समाजातील महिला, मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यात हैदराबाद येथील गायिका अर्चना लोया यांनी संगीतमय वाणीतून सजीव देखावा साकारला. या विवाह सोहळ्यात मेहंदी, माहेरा, वरात, विवाह उत्सव आदी देखावे सादर करण्यात आले.
बुलंद आवाजाचे जादूगार गायक आदर्श शिंदे यांच्या सुरांनी अकोलेकर मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते तिक्ष्णगत महोत्सवाचे. गौरक्षण संस्थानमागील मैदानावर झालेल्या ‘आदर्श शिंदे कॉन्सर्ट’ला अकोल्यातील तरुणाईने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. मंगळवारी (दि.१६) सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला प्लेबॅक सिंगर जनार्दन धात्रट यांनी ‘चंद्रभागेच्या तीरी’ हे भक्तीगीत सादर केले. त्यानंतर अमित पगारे यांनी ‘आता तरी देवा मला पावशील काय’ आणि प्रबुद्ध जाधव यांनी ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ ही भक्तिगीते सादर केली. जसा आदर्श शिंदे यांचा रंगमंचावर प्रवेश झाला, तसा उपस्थित हजारो तरुणांनी एकच जल्लोष केला. त्यांनी आजोबा प्रल्हाद शिंदे आणि वडील आनंद शिंदे यांची ‘तूच सुखकर्ता’, ‘पार्वतीच्या बाळा’ ही गाणी सादर करून कार्यक्रमाची उंची गाठली. ‘मोरया मोरया’ गाणे सुरू होताच संपूर्ण मैदानात टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी आदर्श शिंदे म्हणाले की, आज येथे अंकुश चौधरी असता, तर नक्कीच नाचला असता. त्यानंतर ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’, ‘अरे भावा माझा जयभीम घ्यावा’, ‘माझ्या शिवबारं’ यांसारख्या गाण्यांनी अकोलेकरांना मंत्रमुग्ध केले. तर, ‘नव्हतं मिळत पोटाला, आता कमी नाही नोटाला. माझ्या भीमाची पुण्याई, अंगठी सोन्याची बोटाला’ या गाण्यावर उपस्थित तरुणाई बेधुंदपणे थिरकली. मुंबईहून आलेल्या विशेष वाद्यवृंदाने संगीताची साथ दिली, तर निवेदिका माधुरी भारती, पल्लवी डोंगरे व आकांक्षा गोमासे यांनी बहारदार निवेदनाने प्रेक्षकांची मने जिंकली. तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटी व अजिंक्य भारत परिवाराचे डॉ. सुगत वाघमारे, तनुजा सुगत वाघमारे व तिक्ष्णगत वाघमारे यांनी अकोलेरांना ही पर्वणी उपलब्ध करुन दिली. आदर्श शिंदे म्हणाले की, अकोल्यात बोलावल्याबद्दल मी डॉ. सुगत वाघमारे यांचा ऋणी आहे. आज प्रथमच मला अकोल्याच्या भूमीत आजोबा व वडिलांची गाणी गाण्याचे भाग्य लाभले, अशी भावना आदर्श शिंदे यांनी व्यक्त केली. लावणीने रंगवली मैफल कार्यक्रमात अबोली गिऱ्हे यांनी ‘खेळताना रंग बाई होळीचा’ ही लावणी सादर केली. त्यांच्या नृत्याविष्काराला युवक-युवतींनी प्रचंड दाद दिली.
खासगी भंगार बसेस सातपुड्यातील रस्त्यांवर धावत असल्याने आदिवासी बांधवांचा जीव टांगणीला लागला आहे. भंगार बसमुळे वायुप्रदूषण वाढत असून वाहतूक कोंडीही होत आहे. परमिट नसलेल्या व कालबाह्य बस अकोटच्या रस्त्यावर धावत आहेत. अशा भंगार बसवर परिवहन विभाग व स्थानिक पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे. सातपुड्याच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासींच्या अगतिकतेचा फायदा घेत, त्यांची प्रवासी वाहतूक कालबाह्य झालेल्या, कधीही अपघात होऊ शकणाऱ्या खासगी बसेसमधून सुरू आहे. या कालबाह्य बसेसच्या वापराकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जीवघेण्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सातपुड्याच्या कुशीत राहणारे आदिवासी, अमरावती जिल्ह्याचे रहिवासी आहेत परंतु भौगोलिकदृष्ट्या त्यांना अकोट जवळचे पडते. त्यामुळे बाजारहाट व दवाखाना आदी कामांसाठी त्यांना अकोटला यावे लागते. घाटातून वाहतूक, अपघाताची भीती : अकोट ते सावलीखेडा मार्ग डोंगराळ असून घाटाचा रस्ता आहे. या मार्गावर तीव्र उतार व जीवघेणी वळणे आहेत. यापूर्वी या मार्गावर जुनाट बसमुळे अपघात घडल्याची उदाहरणे आहेत. बऱ्याच वाहन चालकांजवळ गाडी चालवण्याचा परवाना सुद्धा नाही. तरी हे वाहनचालक घाटातून गाडी चालवतात, अशीच वाहतूक सुरू राहिली तर मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिनी बस सुरू करा : या मार्गावर एसटी महामंडळाने दोन किंवा तीन मिनी बस सुरू कराव्यात. मिनी बस सेवा सुरू केल्यास आदिवासी बांधवांचा जीवघेणा प्रवास संपेल. या मार्गावरील वाहतूक पाहता एसटी बसला तोटा होणार नाही, याचीही खात्री बाळगता येईल. नादुरुस्त वाहने तसेच धावतात रस्त्यावर : एसटी महामंडळ व खासगी वाहतूकदारांच्या अनेक बसेस भंगारावस्थेत असून त्या रस्त्यावर धावतात. यामुळे इंजिनमधून काळा धूर निघून प्रदूषण होते. प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात: अशा बसेसमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. आरटीओंनी कालबाह्य झालेल्या बसेसवर कारवाई करणे अपेक्षित आहे. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही. वाहतूक कोंडी व नियमभंग: अनेक खासगी बसेस ठरलेल्या थांब्यांवर न थांबता रस्त्यावरच प्रवाशांना चढवतात आणि उतरवतात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते आणि नियमभंग होतो. ^या मार्गावर चालणाऱ्या बसेस शासनाचे सर्व नियम पाळून चालतात की नाही, याची तपासणी करणार आहोत. काही गैरकायदेशीर आढळले तर अशा बसेसवर कारवाई केली जाईल. - किशोर जुनघरे, पो. निरीक्षक, ग्रा. पो. स्टे, अकोट. तपासणी: परिवहन विभागाने सर्व बसेसची विशेषत: खासगींची कठोर व नियमित तपासणी करावी. कारवाई: नादुरुस्त, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बसेसवर दंडात्मक कारवाई, त्यांचे परवाने रद्द करावे. जागरूकता मोहिम: वाहनचालक व मालकांसाठी वाहतूक नियमांबद्दल जागरूकता निर्माण करावी. रेल्वेचा पर्याय बंद मीटर गेज रेल्वे लाइन सुरू होती तेव्हा प्रवासी तुकईथड येथून रेल्वेद्वारे अकोटला येत होते. परंतु ब्रॉड गेज रुपांतरणासाठी हा रेल्वे मार्ग बंद झाला. अकोटपर्यंतच ब्रॉड गेजचे काम सुरू झाले. अशा स्थितीत आदिवासींना खासगी बसेसशिवाय पर्याय नाही. बसेसची तपासणी करू कालबाह्य भंगार बसेस या मार्गावर चालणाऱ्या बसेस कालबाह्य व भंगार झाल्या आहेत. त्यांची तपासणी केली तर त्या वाहतुकीतून बाद ठरू शकतात. परंतु त्या बसेस अकोट ते सावलीखेडा या मार्गावर बिनदिक्कतपणे राजरोसपणे सुरू आहेत. या बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. बसच्या टपावरून प्रवास एका ट्रीपमध्ये अधिकाधिक प्रवासी नेण्यासाठी आणि त्यातून अधिकची कमाई व्हावी यासाठी गोरगरीब आदिवासींना बसच्या टप्पावर सुद्धा बसायला भाग पाडले जाते. बसच्या आत सुद्धा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबले जातात. जीवघेणी वाहतूक डोंगराळ भागातून सुरू होते. प्रवाशांनाही दुसरी सोय नसल्याने आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय शिल्पकलेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री सुमारे 1.30 वाजता त्यांनी वयाच्या 101व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दीर्घायुष्य लाभलेले राम सुतार हे अखेरपर्यंत सृजनशीलतेशी नाते जपणारे व्यक्तिमत्त्व होते. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये उभारलेल्या त्यांच्या भव्य शिल्पकृतींनी भारतीय शिल्पपरंपरेला जागतिक ओळख मिळवून दिली. स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक राष्ट्रीय नेत्यांची स्मारके, तसेच एकता आणि प्रेरणेचे प्रतीक ठरलेले पुतळे ही त्यांची अमूल्य देणगी मानली जाते. त्यांच्या निधनामुळे भारतीय कला, संस्कृती आणि शिल्पकलेच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, कला क्षेत्रातून तसेच विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. जगभरात 200 हून अधिक शिल्पांची निर्मिती करणारे राम सुतार हे नाव केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदराने घेतले जात होते. दिल्लीतील संसद भवन परिसरात उभारलेली त्यांची शिल्पे आजही भारतीय लोकशाहीची साक्ष देतात. राम सुतार यांना त्यांच्या योगदानाबद्दल पद्मश्री, पद्मभूषण तसेच महाराष्ट्र भूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन हा पुरस्कार त्यांच्या हाती सोपवला होता. या भेटीदरम्यान राम सुतार यांनी महाराष्ट्र अभिमान गीत गायले होते, तो क्षण अनेकांसाठी भावूक ठरला. धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावात जन्म अलीकडेच अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते, तो पुतळादेखील राम सुतार यांच्या कलाकृतीचा भाग होता. त्यांच्या शिल्पांमधील सूक्ष्म बारकावे, भावभावना आणि वास्तववादी मांडणी ही त्यांच्या कलेची ओळख होती. राम वनजी सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावात झाला. प्रारंभी त्यांनी श्रीराम कृष्ण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकलेचे धडे घेतले आणि पुढे मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून औपचारिक शिक्षण पूर्ण केले. 1959 साली त्यांनी दिल्लीत माहिती व दूरसंचार मंत्रालयात नोकरी स्वीकारली, मात्र काही वर्षांतच त्यांनी शासकीय सेवा सोडून पूर्णवेळ शिल्पकार म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीमध्ये स्वतःचा स्टुडिओ उभारून त्यांनी आपल्या कलेचा स्वतंत्र प्रवास सुरू केला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सर्वात भव्य आणि ऐतिहासिक प्रकल्प जगातील सर्वात उंच, 182 मीटर उंचीचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा राम सुतार यांच्या आयुष्यातील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक प्रकल्प मानला जातो. या शिल्पाच्या संकल्पनेपासून ते डिझाइनपर्यंत संपूर्ण सर्जनशील वाटचाल त्यांनीच केली. सुमारे 60 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 50 हून अधिक भव्य शिल्पांची निर्मिती केली. संसद भवनातील महात्मा गांधी यांची मूर्ती, तसेच तिच्या प्रतिकृती इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया येथे पोहोचल्या. 1953 साली मेयो गोल्ड मेडल मिळवणारे राम सुतार हे केवळ शिल्पकार नव्हते, तर भारतीय संस्कृतीचे जागतिक प्रतिनिधी होते. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्राचे अपूरणीय नुकसान झाले असून, त्यांची कलाकृतीच आता त्यांची ओळख जपत राहणार आहे.
राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात त्यांच्याच खात्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनास्त्र उगारले आहे. ७२ तासांत समेट न घडल्यास आगामी शुक्रवार, १९ डिसेंबरपासून अमरावतीसह राज्यभर ‘कामकाज बंद’चा निर्णय तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने घेतला आहे. पुण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच काम बंद आंदोलन सुरु केले आहे. त्याचे लोण आता अमरावतीसह राज्यभरही पसरले आहे. संबंधित मंत्र्यांचा कारभार हा ''बेभान'' आणि ''बेलगाम'' असल्याचा आरोप महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लावला आहे. त्यांच्यामते मंत्री महोदय कोणतीही योग्य चौकशी न करता, अधिकाऱ्यांवर एकतर्फी निलंबनाची कारवाई करीत आहेत. या असंतोषामुळेच कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठीचे निवेदन आज, बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय लोखंडे, कार्याध्यक्ष अक्षय मंडवे, उपाध्यक्ष अरविंद माळवे आणि सचिव अशोक काळीवकर यांच्या नेतृत्वात देण्यात आलेले हे निवेदन अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी स्वीकारले. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनानुसार महसूल मंत्री हे नैसर्गिक न्यायाची कोणतीही संधी न देता थेट विधिमंडळात निलंबनाची घोषणा करतात, हे योग्य नाही. अर्धन्यायिक कामकाजाच्या प्रकरणात तहसीलदारांनी दिलेले आदेश, तसेच महसूल हक्क नोंदीवरील व ज्या प्रकरणात अपिलाची तरतूद आहे, अशा प्रकरणात किंवा प्रशासकीय कामकाजात चूक झाल्यास विभागीय चौकशीच्या तरतुदी आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १५८ नुसार सदर कामकाजाबाबत दाव्यास प्रतिबंध करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांना संरक्षणही देण्यात आले आहे. पण त्याचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. त्यामुळेच अशा प्रशासकीय त्रुटींसाठी महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे विरुध्द थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येऊ नयेत, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, शिवाजी शिंदे, निनाद लांडे, तहसीलदार पूजा माटोडे, संघटनेचे ब्रिजेश वस्तानी, ज्ञानेश गुर्जर, सौरभ वानखडे, कमल गाठे आदी उपस्थित होते. विक्रमी निलंबन बावनकुळे यांच्या कार्यकाळात केवळ एका वर्षात महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विक्रमी संख्येने निलंबने झाली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने घेतलेल्या नोंदीनुसार जानेवारी २०२५ पासून आजपावेतो एकूण २८ नायब तहसीलदार व तहसिलदार, ४ उपजिल्हाधिकारी, ८ मंडळ अधिकारी, ४ ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी आणि महसूल सहाय्यक यांना निलंबित करण्यात आले आहे. कामकाज होणार ठप्प महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून तोच राज्य सरकारचा चेहरा आहे. यास्तव सदर आंदोलनातून नैसर्गिक आपत्ती आणि निवडणूक कामकाज सांभाळणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. याशिवाय विभागीय आयुक्त, उपायुक्त, जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी हेही या आंदोलनात नाहीत. त्यामुळे संप झाल्यास एसडीओ, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, महसूल अधिकारी, महसूल सहायक, तलाठी यांच्या स्तरावरील कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित होईल. कर्मचारी प्रचंड तणावात मंत्री महोदयांद्वारे केल्या जाणाऱ्या सततच्या निलंबनामुळे अधिकारी व कर्मचारी प्रचंड तणावात असून ते दहशतीखाली काम करीत आहेत. आता केवळ आपल्यावरच आमचा विश्वास असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना, विदर्भ पटवारी संघटना, विदर्भ मंडळ अधिकारी संघटना तसेच विदर्भ कर्मचारी संघटना व म.रा. महसूल कर्मचारी संघटना यांनी स्थापन केलेल्या म.रा. महसूल कर्मचारी व अधिकारी समन्वय महासंघानेही यात उडी घेतली आहे.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेला एक जण जागीच ठार:तिवसा तालुक्यातील वाठोडा गावाजवळील घटना
तिवसा तालुक्यातील कुऱ्हा ते तिवसा मार्गावरील वाठोडा गावाजवळ नॅनो कार व दुचाकीमध्ये धडक झाली. त्यानंतर घटनास्थळी मदतकार्यासाठी थांबलेल्या ७ ते ८ जणांसह स्विफ्ट डिझायर कारला मागून भरधाव आलेल्या स्कोडा कारने जबर धडक दिली. एकाच ठिकाणी झालेल्या या दोन अपघातात जखमींच्या मदतीसाठी गेलेला एक जण ठार झाला असून अन्य सहा जण जखमी झाले आहेत. तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्द गावाजवळ मंगळवार १६ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार घोटा येथील तीन मित्र हे एमएच २७ बीए १०५६ क्रमांकाच्या युनिकॉन दुचाकीने गावी जात होते. दरम्यान कुऱ्हा गावाकडून येणाऱ्या एमएच २७ एआर ३५०२ क्रमांकाच्या नॅनो कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात घोटा येथील तिन्ही मित्र जखमी झाले. यावेळी मदतीसाठी वाठोडा खुर्द येथील युवक काँग्रेसचे लुकेश केणे हे घटनास्थळी दाखल झाले. इतक्यात तिवसाकडून येणाऱ्या एमएच ३४,एएम ५४७७ क्रमांकांच्या भरधाव स्कोडाने केणे यांच्या स्विफ्ट डिझायर कारला व मदतीसाठी उभ्या ७ ते ८ जणांना जबर धडक दिली.ज्यात अनिल खारकर व नीलेश लोंदे हे गंभीर जखमी झाले. यात खारकर यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी धाव घेत सर्व जखमींना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींची स्थिती बघता डॉक्टरांनी सर्व जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय पाठवले. मृतक अनिल खारकर यांच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून दोन्ही कार चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातील सहा जखमी या अपघातात अनिल शेषराव खारकर (वय ६६ रा. वाठोडा खुर्द) यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील अजय बबन चव्हाण, वय ३०,रोशन श्रीधर चव्हाण, वय २९,शुभम विजय इंगोले, वय ३०,सर्व रा. घोटा, नॅनो कार चालक चंद्रशेखर मनोहर ठाकूर वय ५४ रा. सातरगाव, तसेच स्कोडा कार चालक दीपक सुभाष पडोळे, वय ३६ रा. कुऱ्हा, नीलेश केशवराव लोंदे वय ४२ रा. वाठोडा खुर्द अशी सहा जखमीची नावे आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिंचोना येथील विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी २० गुंठ्यांवर परसबाग फुलवली. यात लावलेल्या भाजा पाल्यापासून विद्यार्थी शाळेला दिवसाकाठी १५०० रुपयांची कमाई करून देत आहेत. विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा सेंद्रिय भाजीपाला बाजार हा “शिकत-शिकत कमवा” या संकल्पनेचा उत्तम नमुना ठरला असून इतर शाळांसाठीही तो प्रेरणादायी ठरत आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व, व्यवहारज्ञान, आर्थिक साक्षरता होत आहे. ६० शिक्षकांकडून भाजीपाला खरेदी ^शिक्षण परिषदेला उपस्थित असलेल्या ६० शिक्षकांनी या बाजारातून खरेदी केली. कमी दरात भाजीपाला व फळे उपलब्ध करून दिल्यानंतरही या उपक्रमातून शाळेला सुमारे १२०० ते १५०० रुपये उत्पन्न प्राप्त झाले.हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित शिक्षण देणारा तसेच सेंद्रिय शेतीबाबत जागृती निर्माण करणारा ठरला. सुभाष वानखडे, मुख्याध्यापक, चिंचोना. सेंद्रिय शेतीला चालना देण्याचा लक्षवेधी प्रयोग शिक्षण परिषदेसाठी आलेल्या शिक्षकांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे व कौशल्याचे विशेष कौतुक केले.विद्यार्थ्यांच् या सहभागातून भरवलेला हा सेंद्रिय भाजीपाला बाजार हा केवळ विक्रीपुरता मर्यादित न राहता “शिकत-शिकत कमवा” या संकल्पनेचा उत्तम नमुना ठरला असून इतर शाळांसाठीही तो प्रेरणादायी ठरत आहे.
अमरावती सर्वाधिक काळ चालणारी विदर्भातील प्रसिद्ध बहिरम यात्रेच्या पूर्वतयारीसाठी तेथील मंदिर कार्यालयामध्ये विशेष नियोजन व आढावा सभा घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांना महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले. यामध्ये वाहतूक नियंत्रण, पार्कींगस्थळ, खाद्य पदार्थ आणि पाण्याची शुद्धता, फिरते दवाखाने आदींचा समावेश आहे. येत्या शनिवारपासून यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. तब्बल दीड महिन्यांपर्यंत ही यात्रा चालते. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व विभागांच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला आणि भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यादृष्टीने समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले. मंदिर परिसरात सीसीटीव्ही आणि स्वच्छता राखण्यावरही यावेळी विशेष भर देण्यात आला. बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बाळासाहेब बायस, गटविकास अधिकारी डॉ नीलेश वानखडे, उपविभागीय महसूल अधिकारी बळवंत अरखराव, एबीडीओ गणेश घोगरकर, यात्रा व्यवस्थापक रामेश्वर रामागड, शिरजगाव कसबाचे ठाणेदार गवई यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, बांधकाम उपअभियंता, पाणीपुरवठा उपअभियंता, ग्रामपंचायत, मंदिर प्रशासन, विद्युत व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बहिरम यात्रेच्या नियोजन बैठकीला मार्गदर्शन करताना जि.प. च्या सीईओ संजीता महापात्र. {अन्न व औषधी प्रशासन विभागाने सर्व खानावळींची नियमित तपासणी करावी आणि स्वच्छतेचे नियम पाळले जातील, याची खात्री करावी, अशा सूचना दिल्या. {वाहतूक व पार्किंग- शनिवार आणि रविवारी यात्रेत मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी पोलीस विभागाला विशेष पार्किंग व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. {माकडांचा बंदोबस्त व सुरक्षा- यात्रेचे ठिकाण जंगल परिसराजवळ असल्याने माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. वीज आणि पाणीपुरवठा- यात्रेच्या काळात अखंडित वीजपुरवठा रहावा, यासाठी विद्युत विभागाने खबरदारी घ्यावी तसेच पाणीपुरवठा विभागाने शुद्ध पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. {आरोग्य सुविधा- यात्रा काळात आरोग्य विभागाने तात्पुरते दवाखाने आणि २४ तास रुग्णवाहिका तैनात ठेवावी. ''स्वच्छ बहिरम'' अभियानांतर्गत कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र पथके नेमण्याच्या सूचना दिल्या. यात्रेच्या काळात कुठेही अस्वच्छता होणार नाही आणि प्लास्टिकचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
शहरातील साफसफाईची सद्यस्थिती, रस्त्यांची अवस्था, सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा तसेच वाहतूक व नागरिकांच्या दैनंदिन वर्दळीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. तसेच काही ठिकाणी साफसफाईची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देत स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसून, कोणाचीही गय केली जणार नसल्याचे मनपा आयुक्त सौंम्या शर्मा यानी स्पष्ट केले. शहर स्वच्छ, सुंदर व अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्तांनी सकाळी शहरातील प्रमुख भागांची सविस्तर पाहणी केली. या पाहणीदरम्यान जयस्तंभ चौक ते जुना कॉटन मार्केट, चौधरी चौक, विलास नगर, गाडगेनगर परिसराचा आयुक्तांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. विशेषतः गाडगेनगर परिसरात उभे असलेले कंटेनर तत्काळ हटवण्याचे आदेश दिले. या कंटेनरमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून परिसरातील नागरिकांना गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पाहणीदरम्यान शहरातील विविध भागांत अतिक्रमणाची समस्या गंभीर असल्याचे आढळून आले. यावर कठोर भूमिका घेत आयुक्तांनी संबंधित विभागांना कोठेही अतिक्रमण आढळून आल्यास त्वरित व प्रभावी कारवाई करून अतिक्रमण हटविण्याचे स्पष्ट निर्देश दिले. अतिक्रमणामुळे शहराचे सौंदर्य व शिस्त बाधित होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी आयुक्तांनी नागरिकांना स्वच्छतेबाबत जाणीवपूर्वक सहभाग घेण्याचे आवाहन केले. शहर स्वच्छता, सुयोग्य नियोजन व अतिक्रमणमुक्त वातावरण राखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असून, यापुढेही अशा प्रकारच्या नियमित पाहण्या व कठोर कारवाया करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पाहणीमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक मजबूत होणार असून, अतिक्रमणावर नियंत्रण मिळविण्यास प्रशासनाला बळ मिळणार असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या पाहणीदरम्यान वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, स्वास्थ्य अधीक्षक विजय बुरे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजू डिक्याव, श्रीकांत डवरे, स्वास्थ्य निरीक्षक तसेच मनपा कर्मचारी उपस्थित होते. सुका, ओला कचरा वेगवेगळा द्यावा “शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ महानगरपालिकेची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, ओला व सुका कचरा घंटागाड्यांना वेगळा करून द्यावा, तसेच अतिक्रमणास प्रोत्साहन देऊ नये. स्वच्छ व शिस्तबद्ध शहरासाठी प्रशासनास सहकार्य करावे,” असे आवाहन आयुक्तांनी नागरिकांना केले.
सध्या थंडीने अक्कलकोट तालुका गारठला असून सर्वत्र थंडीने हुडहुडी भरली आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे ज्वारीसह गहु, हरभरा पिकांना पोषक वातावरण मिळत असल्याचे कृषी विभागाकडून बोलले जात आहे. यंदा अक्कलकोट तालुक्यात केवळ १९% ज्वारीची पेरणी झाली आहे. अतिवृष्टीमुळे पेरणी युक्त वाफसा न मिळाल्यामुळे ज्वारीच्या पेरणीत घट झाली असून गहू व हरभरा क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे या थंडीच्या पोषक वातावरणात ज्वारी, गहु, हरभरा पिक बहरला आहे. यंदा ज्वारीचे सरासरी क्षेत्र ३३ हजार १९३ हेक्टर असून यात पेरणी झालेली क्षेत्र ६ हजार ४५२ हेक्टर ज्वारी पेरणी पूर्ण झाली आहे. या हंगामात मका सरासरी १६८६ हेक्टर असून त्यापैकी केवळ ३९ हेक्टर पेरणी झाली आहे. म्हणजे मका २. ३१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. या रब्बी हंगामात गहु पिक सरासरी क्षेत्र ९६ ८५ हेक्टर असून 3४९हेक्टर पेरणी पूर्ण झाली होती. ही पेरणी नोव्हेंबर महिन्यातील असून आणखीन १०% टक्के पेरणी नोव्हेंबर अखेर व डिसेंबर महिन्यापर्यंत चालु असल्याचे कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे यांनी म्हटले आहे. या घटलेल्या पेरणी मुळे यंदा शेतकरी उदासीन दिसून येत आहे. कारण येत्या शुक्रवार दि, १९ डिसेंबर २०२५ रोजी वेळअमावश्या हा शेतकऱ्यांचा उत्साहाचा सण येत आहे. या वेळअमावश्या सणाला ग्रामीण भागात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. या सणादिवशी शेतकरी सहकुटुंब बैलगाडीने शेतात जाऊन शेतात विधिवत पूजन करून आपला पूर्ण दिवस शेतात घालवतात. यंदा अमावस्येला गावंच्या गांव संपूर्ण अबाल वृद्धांसह शेतात जात असल्याने गांव ओसाड पडलेला दिसून येतो, त्यामुळे गावात शांतता दिसून येते. दिवसभर रानात मौजमजा, सणानिमित्त बनवलेली,कडक बाजरी भाकर, शेंगा पोळी, पूरण पोळी, दुध, दही, यासह पंचपक्वान बनवलेली जेवणाची मेजवानी असते, यामुळे दिवसभर शेतकरी शेतात व्यस्थ असतो. मागील चार- पाच दिवसांपासून कडाका वाढला आहे. चिदानंद खोबण, कृषी सहाय्यक सध्याचे हवामान सर्व पिकांना उपयुक्त ^यावर्षी ज्वारी ऐवजी हरभरा, गहु, ऊस इत्यादी पिके रानात असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. यंदा अतिवृष्टीमुळे शेतात सर्व विहिरी तुडुंब भरलेली असून बोरींना देखील भरपूर पाणी आहे. पण या कडाक्याच्या थंडीमुळे विहिरी भरलेल्या असून सुद्धा शेतकरी पिकांना पाणी सोडताना दिसून येत नाही. सध्याचा हवामान सर्व पिकांना उपयुक्त आहे.
सीमावर्ती भागात विशेष महत्व असलेल्या वेळा अमावास्या सणासाठी बाजारात बुधवारी (दि. १७) मोठी गर्दी झाली आहे. या सणाचा सर्वाधीक महत्व असलेला भज्जी हा मेणु तयार करण्यासाठी लागणारा भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. भज्जीसाठी पातीसह कांदा, मेथी, हरबरा, वटाणा, वरण्याच्या शेंगा, काकडी, वांगी, कोंथीबीर, आद्रक, लसुन, हिरवी चिंच या भाज्यांची आवश्यकता असते. त्यामुळे बुधवारी देवणीसह वलांडी, धनेगाव, दवणहिप्परगा, जवळगा, बोरोळ या ग्रामीन भागातही भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. यावर्षी सततच्या पावसाने कांदा या पिकांचे नुकसान झाले असुन त्यामुळे पातीसह कांदा पन्नास रुपयाला किलो, तर मेथी पंधरा ते विस रुपयाला एक जुडी मिळत होती. गाजर चाळीस रुपये किलो, तर हिरवी मिरची ऐंशी रुपये किलोने उपलब्ध होती. वेळअमावस्या या पारंपरिक सणानिमित्त ग्रामीण व निमशहरी भागातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विशेषतः कांदा, मेथी, मिरची यांसारख्या भाज्यांसह ज्वारी व बाजरीच्या कडक भाकरीसाठी बाजारात चांगलीच झुंबड उडाली आहे. सकाळपासूनच बाजारात महिलांची व शेतकरी कुटुंबांची गर्दी वाढलेली दिसून आली. वेळाअमावस्या हा सण शुक्रवारी असुन दोन दिवस अगोदरच भज्जीचा मेणु तयार करण्यासाठी घराघरातील महिलांची लगबग सुरु असते. त्यामुळे बुधवारी ग्राहकांनी खरेदीस प्राधान्य दिले. विक्रेत्यांची सुगी भाजीपाल्याची दरवर्षीची मागणी लक्षात घेउन बहुतांश शेतकरी आपल्या शेतीत आवश्यक भाजीपाल्याची लागवड करतात. सणाच्या दोन दिवस अगोदरच खरेदी होत असल्याने व चांगला दर मिळत असल्याने शेतकरी लागवडीला प्राधान्य देतात. यावर्षी पावसाने भाजापाल्याचे नुकसान झाल्याने उपलब्ध भाज्यांना चांगला दर मिळत असुन त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. कडक ज्वारी भाकरीच्या मागणीत मोठी वाढ वेळआमवस्येला भज्जीसोबत भाकरी अन अंबील हा महत्वाचा मेणु, बदलत्या स्थीतीत घरच्या भाकरीसोबतच विकतच अन कडक भाकरीलाही घराघरात मागणी वाढु लागली आहे. बडीज्वारी, बाजरी, पिवळीच्या कडक भाकरीला मागणी असुन पाच रुपये प्रतिनग दराप्रमाणे भाकरीची विक्री होत आहे.
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा असतात. त्याचबरोबर चांगले आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी पाणी, विज, रस्ते या बाबी अत्यंत महत्वाच्या ठरतात. या सुविधांची पूर्तता करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्य आणि संबंधित परिसरातील नगरसेवकांची जबाबदारी असते. परंतु, लातूर शहरातील महत्वाचा भाग असलेल्या प्रभाग क्र. १० मधील रहिवाशांना या सुविधा तर मिळतचं नाहीत शिवाय प्रभागातील विविध परिसरात तुंबलेल्या गटारी, जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढिग, मोकाट जनावरांचा उपद्रव आणि निकृष्ट दर्जाचे रस्त्यांमुळे होणाऱ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. जुना रेणापूर नाका ते एक नंबर चौक या जुन्या एमआयडीसी रोडच्या लगताचा परिसर हा या प्रभागात येतो. यामध्ये सुभेदार रामजी नगर, नरसिंह नगर, इंडिया नगर, बजरंग चौक, श्याम नगरचा काही भाग, कल्पना नगर, नेताजी नगर, उत्कर्ष सोसयटी, शारदा कॉलनी, आलमपुरा भाग आहेत. साधारणत: २०,००० लोकवस्तीचा हा प्रभाग आहे. परंतु, या परिसरात सुविधांपेक्षा असुविधांच जास्त आहे. यामध्ये विशेष करून अस्वच्छत आणि तुंबलेल्या गटारी, निकृष्ट दर्जाचे रस्ते, उखडलेले रस्ते, कुठे-कुठे रस्तेच नाही, मोकाट जनावरे, रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनेक मोकळ्या जागांमध्ये कचऱ्याचे टाकलेले ढिग, बंद पथदिवे, ग्रीन बेल्टची दुरावस्था, अनुचित प्रकार अन् टवाळखोरांनी मांडलेला अच्छाद यासह असंख्य अडचणी प्रत्येक नगर, चौक, कॉलनीमध्ये आहे. श्याम नगर परिसरात शाळा असल्यामुळे रहदारी अधिक आहे आहे. त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीचे टवाळखोर त्रासदायक ठरत आहे. कचरा संकलनासाठी केवळ २ घंटागाडी असून त्या आंतर्गत रस्त्यावर जात नाहीत. पाच-पाच महिने गटारी काढल्या जात नाही. काढल्या तरी त्या रस्त्यावरच गाळ पडून असतो. त्यामुळे परिसरात दूर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झालेले आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यवर घातक परिणाम होते आहे. परिसरात असलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये कधी औषधी असतात कधी नसतात. औषधी बाहेरून घ्यायला लागतात. अधिकारी, लोकप्रतिनिधी येतात आणि फोटोसेशन करून निघून जातात. प्रभागात कुठलेही धोरणात्मक कामे नाही, मुलभूत सुविधा मिळण्याच्या अपेक्षा ठरल्या फोल ठरल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. सुभेदार रामजी नगर : निकृष्ट रस्ते, प्लेवरब्लॉक रस्ते उखडले. मोकाट जनावरांंचा उपद्रव, ग्रीन बेल्टचे काम नाही, चोऱ्यांचे प्रमाण अधिक नरसिंह नगर : पोलिस चौकी चार ते पाच वर्षांसन बंद, गटारी तुंबलेल्या, निकृष्ट रस्ता, कचरासमस्या, मोकळ्या प्लॉटला डंपिंग ग्राऊंड केले. इंडिया नगर : कचरा समस्या, अनेक ठिकाणी रस्ते नाहीत, असलेले रस्ते खराब, अमृत योजनेची पाईपलाईन जोडलेली नाही, कमी दाबाने पाणी येते, पथदिव्यांची दुरावस्था. बजरंग चौक : कचऱ्याचे ढिग, मोकाट जानावरांचा वावर, जूना रेणापूर नाका ते १ नंबर रस्त्यावर ड्रेनेच झाकन वरी आल्यामुळे अपघातांची वाढलेली संख्या. कल्पना नगर : ग्रीन बेल्ड अविकसीत, गवत कचरा वाढला, अस्वच्छता, मोकाट जनारांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे.
लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक ठिकाणी वेळ आमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा शुक्रवार, दि. १९ डिसेंबर रोजी वेळ आमवस्या साजरी होणार आहे. दरम्यान, वेळ आमावस्येचे औचित्य साधून लातूर शहरातील ज्ञानप्रकाश लर्निंग होम विभाग आणि विद्यानिकेतन विभागातही शेती प्रकल्पात बुधवार, दि. १७ डिसेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने वेळ आमवस्या साजरी करण्यात आली. यावेळी लक्ष्मी आणि पांडवांच्या पुजेसाठी केप उभी करण्यात आली होती . त्यासाठी मागील 10 दिवसांपासून वेगवेगळ्या स्तरावर मिटिंग,चर्चा आणि नियोजन केले गेले.इयत्ता 1 ली ते 6 वी वर्गातील मुलांचा आणि पालकांचा त्यासाठी उत्स्फूर्त सक्रिय सहभाग होता. ज्ञानप्रकाश शैक्षणिक वैविध्यपूर्ण उपक्रम व मुलांना अनुभव संपन्न करण्यासाठी लातूर जिल्ह्यात सुपरिचित आहे. शेती आणि मातीबद्दल कृतज्ञता व्यक्त होणारा वेळ अमावस्या हा सण माहिती व्हावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो. अनुभव आणि ग्रामीण भागातील या संस्कृती विषयी मुलांना माहिती मिळावी.आणि सर्वांसमवेत वनभोजन करण्याचा आनंद घेता यावा ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पात वेळ अमावस्या साजरी केली जाते. ज्ञानप्रकाश प्रतिष्ठान ने ही खीर,भजी बनविण्यासाठी आचारी व साहित्य उपलब्ध करून दिले. काल रात्री पालक व शिक्षिकांनी भाजी निवडणं, लागणारा मसाला तयार करणं हे काम केले. वेळ अमावस्येसाठी विधिवत सर्व मांडणी करण्यात आली. सकाळी ९ वाजता लातूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी साहेबराव नरवाडे, वेळ अमावस्या पालक समिती सदस्य बडगिरे , ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाचे प्रमुख सतीश नरहरे, मुख्याध्यापिका तथा संचालक सविता नरहरे यांच्या उपस्थितीत पूजन झाले. यावेळी पोलिस अधिकारी साहेबराव नरवाडे यांनी मुलांशी संवाद साधला. बालवयात मोबाईलचा होणारा अतिरिक्त वापर, कळत नकळत होणारे गुन्हे याबद्दल मुलांना जागरूक केले तसेच प्रकल्प,शाळा,शिक्षक व पालक यांना स्वाभिमान वाटेल असे आपण काम करा असा संदेश दिला. लागणाऱ्या सर्व साहित्याची व्यवस्था पालक समितीने केली. वलघ्या वलघ्या सालम पलघ्याच्या गजर मुलांनी केला .यानिमित्ताने लातूर शहरातील शैक्षणिक,व्यावसायिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी वेळ अमावस्या निमित्त भोजनाचा आनंद घेतला. खीर, भाकरी, धपाट्याचा विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद विद्यार्थ्यांनी वेळ अमावस्या भोजन केले. खीर,आंबील,बाजरी - ज्वारीची भाकरी ,चपाती,धपाटे ,आंबील इत्यादी चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थाचा खाऊन आनंद घेतला.
अहिल्यानगर महापालिका निवडणूक भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार) या तिन्ही पक्षांकडून महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढणार असल्याचे तिन्ही पक्षाच्या प्रमुखांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेला बुधवारी सुरुवात झाली आहे. यात तिन्ही पक्षांकडील विद्यमान सदस्य व सक्षम असलेल्या इच्छुकांबाबत चर्चा झाली. दरम्यान, शिवसेनेचे विद्यमानसदस्य असणाऱ्या सहा ते सात जागांवर भाजपकडून दावा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जागावाटपात ओढाताण होण्याची शक्यता आहे. तिन्ही पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक असल्याचे दावे केले आहेत. प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतरही त्यांच्यात जागावाटपाला मुहूर्त न मिळाल्याने महायुती होणार की नाही, अशी चर्चा होती. मात्र, बुधवारी आमदार जगताप यांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागावाटपासंदर्भात पहिली बैठक पार पडली. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव व आमदार जगताप यांच्यात प्राथमिक चर्चा झाली. तिन्ही पक्षांकडील उर्वरित पान ४ विद्यमान सदस्यांच्या जागांवरही चर्चा होईल प्राथमिक चर्चेत तिन्ही पक्षांकडील विद्यमान नगरसेवक व इच्छुकांबाबत चर्चा झाली. आमच्याकडे २० विद्यमान नगरसेवक आहेत. विद्यमान जागा त्या त्या पक्षाला सोडून इतर जागांवर चर्चा होईल का, असे विचारले असता विद्यमान सदस्यांच्या जागांवरही चर्चा होईल, असे भाजप शहर जिल्हाध्यक्ष मोहिते यांनी सांगितले. तर, आमच्याकडे २१ विद्यमान असून, केवळ प्राथमिक चर्चा झाली आहे, असे अनिल शिंदे यांनी सांगितले. लोकसभेला विरोध करणाऱ्या नगरसेवकांवर विखेंचा आक्षेप पूर्वी ठाकरे गटात असलेल्या व सध्या शिंदे गटात असलेल्या नगरसेवकांनी लोकसभा निवडणुकीवेळी माजी खासदार सुजय विखे यांच्या विरोधात काम केले होते. त्यातील काहींनी आक्रमक भूमिका घेतली होती. या नगरसेवकांच्या उमेदवारीवर विखेंनी आक्षेप घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच, काही प्रभागात चारही जागांवर सेनेचे विद्यमान आहेत. मात्र, तेथील जागांवरही भाजपकडून इच्छुक असल्याने त्यांच्यासाठी शिवसेनेने जागा सोडाव्यात किंवा भाजपकडील इच्छुकांना सेनेच्या चिन्हावर उमेदवारी द्यावी, असा पर्याय पुढे करण्यात आल्याची चर्चा आहे.
ध्येय नेहमी उच्च ठेवावे आणि ते साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण कष्ट करण्याची तयारी ठेवावी. प्रयत्नपूर्वक प्रयत्न केल्यासच भारत आत्मनिर्भर बनवण्याचे ध्येय पूर्ण होईल, असे प्रतिपादन गंधर्व इंजिनिअरचे संचालक सुहास कुलकर्णी यांनी केले. सांगळे गल्ली येथील श्री समर्थ विद्यामंदिर माध्यमिक विभागाचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी शालेय समितीचे चेअरमन स्वप्निल कुलकर्णी, श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष दीपक ओहोळ, प्र. स. ओहोळ, सचिव सुरेश शिरसागर, संजय कुलकर्णी, विकास सोनटक्के आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक सुनील कानडे यांनी प्रास्ताविकात स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे सांगितले. विद्यार्थी, शाळा व शिक्षक या त्रिवेणी संगमातून तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रेरणेतून विद्यालयाची प्रगती होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर त्यांनी शालेय अहवालाचे वाचन केले. विद्यार्थी तेजस वाघ व श्रेया पिस्का यांनी अतिथी व अध्यक्षांच्या स्वागत प्रस्तावाला अनुमोदन दिले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक गायकवाड, श्रुती कुलकर्णी व शारदा होशिंग यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक टकले सर यांनी प्रमुख अतिथी व अध्यक्षांचा परिचय करून दिला. कुलकर्णी पुढे म्हणाले, प्रत्येकाने स्वतःमधील चांगले गुण व अवगुण ओळखले पाहिजेत. आपली स्पर्धा जगाशी नसून ती स्वतःशीच असते. ‘मीच माझा स्पर्धक आणि उद्याचा नवा ध्यास’ असे ठरवून स्वतःमध्ये सतत सुधारणा घडवून आणाव्यात. विद्यार्थ्यांनी पालकांशी संवाद साधावा आणि पालकांनीही मुलांना वेळ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. संस्थेचा अहवाल सुरेश क्षीरसागर यांनी सादर केला. इयत्ता दहावीतील विद्यार्थी सारंग जोशी व मनस्वी कोरडे यांनी मनोगत व्यक्त केले. ठेवीदार व क्रीडा स्पर्धा यादीचे वाचन योगिता कुलकर्णी यांनी, तर सांस्कृतिक स्पर्धा यादीचे वाचन नागरगोजे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. आदर्श विद्यार्थी म्हणून सारंग जोशी, आदर्श विद्यार्थिनी म्हणून चितळे स्नेहल व सर्वसाधारण कुलकर्णी, तर आदर्श उत्कृष्ट खेळाडू म्हणून काव्यश्री शिरापुरी यांना पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा होशिंग यांनी केले श्रद्धा नागरगोजे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये जिल्हा परिषदेच्या १०० पेक्षा अधिक पट असलेल्या शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करणेच्या उददेशाने माझी आदर्श शाळा हा उपक्रम सुरु केला आहे. भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासपूरक उपक्रम, प्रशासकीय बाबी नाविन्यपूर्ण उपक्रम या निकषांवर आधारीत वर्षाच्या शेवटी या शाळांचे अंतिम मूल्यांकन होणार आहे. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील शाळांमध्ये माझी आदर्श शाळा उपक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे. उपक्रमाशी संबंधित मुद्द्यानुसार आपत्ती व्यवस्थापनांतर्गत जिल्हा परिषदेच्या बीट शाळा केडगाव येथे अग्निशमन दल अहिल्यानगर महानगरपालिका कार्यालय यांचे सहकार्याने विद्यार्थ्यांना व केंद्रातील सर्व मुख्याध्यापक यांना प्रात्यक्षिकाद्वारे अग्निशमन विषयक मार्गदर्शन करण्यात आले. अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी एस. यु. मिसाळ, अशोक कार्ले, वाहनचालक भांगरे, फायरमन ऋषी घोंगडे, मच्छिंद्र चितळे, करन राठोड, विठ्ठल चितळकर यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाद्वारे नैसर्गिक आपत्ती किंवा अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे रक्षण कसे करावे, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी माक ड्रिलसाठी स्वतः उपस्थित राहून माझी आदर्श शाळा उपक्रमांतर्गत केडगाव शाळेत होत असलेल्या सकारात्मक बदलासंदर्भात बीट विस्तार अधिकारी निर्मला साठे, केंद्रप्रमुख भगवान बोरुडे, मुख्याध्यापक शोभा काळे व शाळेतील शिक्षक आसिफ शेख, महेश भणभणे, रोहिणी लगड, शरद शेरकर यांचे कौतुक केले. यावेळी विस्तारअधिकारी रवींद्र कापरे, निर्मला साठे, केंद्रप्रमुख उत्तम भोसले, केंद्र समन्वयक संतोष गवळी, केंद्रातील मुख्याध्यापक जाधव, किसन दुधाडे आदी उपस्थित होते. सदर प्रात्यक्षिक आयोजनास डॉ. संदीप पवार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब नगरे यांनी केले. फायरमन यांनी प्रात्यक्षिक दरम्यान रोपवायर लाईफ रिंग, लाईफ जॅकेट, स्नेक स्टीक, स्ट्रेचर्स, हायड्रोलिक जॅक, स्पेडर कटर चैन स्वा, एबीसी टाईप उपकरणे, बीए सेट यांबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती दिली.
विद्यार्थीदशेत असताना खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र संयम महत्वाचा आहे. जीवनात संयम बाळगल्यास यश निश्चित आहे. त्यासाठी संयमाची गरज आहे. हर्ष तनपुरे यांनी केले. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज क्रीडांगण विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. तनपुरे पुढे म्हणाले, अंध विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यांना ऐकयला येत नाही, दिसतही नाही तरी जीवनाचा खेळ सयंमाने यशस्वी करतात. यासाठी त्यांच्या शिक्षकांना कष्ट घ्यावे लागतात. अंध, दिव्यांग असूनही मोठ्या आत्मविश्वासाने न घाबरता व्यासपीठावर आपले कौशल्य दाखवतात. प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासाबरोबर एका खेळामध्ये प्राविण्य मिळवले पाहिजे. म्हणून संस्थेच्यावतीने आम्ही असा प्रयत्नात आहोत की प्रत्येक शाळेला एक उत्कृष्ट असे खेळाचे मैदान असलेच पाहिजे. यावर मुलांचा बौद्धिक ज्ञानाबरोबर शारीरिक विकास झाला पाहिजे, असा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. सुदैवाने आजही ग्रामीण भागात शाळेला क्रीडांगणे आहेत. अंध मुले इतक्या उत्कृष्टपणे कार्य करतात तर आपण सुद्धा अधिक नशीबवान आहोत की आपल्याला सर्व काही डोळ्यांनी दिसते. इतरांना संवेदनेद्वारे आपल्याला जग अनुभवण्याची व जाणीव होण्याची निसर्गाने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. तर आपण अधिक जोमाने अभ्यास केला पाहिजे आणि स्वतःसह आपल्या पालकांचे नाव मोठे केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. यावेळी श्रीरामपूर येथील नॅब अंध विद्यार्थिनींनी दप्तर मुक्त शनिवारनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळेस विद्यार्थी व उपस्थितांचे डोळे पाणवले. यावेळी दैवत उद्योग समूहाचे केशव शिंदे, सुरेश करपे, राष्ट्रवादीचे सुरेश निमसे, ज्ञानेश्वर कोळसे, ज्ञानेश्वर खुळे, बाळासाहेब जाधव, सरपंच लीलाताई गायकवाड, राजेंद्र गायकवाड, रविंद्र मोरे आदी उपस्थित होते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व नाशिक येथील कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल संस्थेबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. युवा उद्योजक तयार करणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यापीठातील तंत्रज्ञान अवगत करणे, नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे व संस्थेचे सीईओ रवींद्र अमृतकर यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास खर्चे म्हणाले, शेतीमध्ये मोठे बदल होत आहेत. शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत. विद्यापीठातही विविध पिकांवर नाविन्यपूर्ण संशोधन झालेले आहे. हे संशोधन जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. डॉ. ससाणे यांनी या कराराबद्दल माहिती दिली. याप्रसंगी कार्डियन करेक्टचे अमृतकर यांनी त्यांच्या संस्थेमार्फत सध्या सुरू असलेल्या कम्युनिटी रेडिओ तसेच कृषी कौशल्य परिषदेमार्फत विविध फळांचे मूल्यवर्धन याविषयी माहिती दिली. यावेळी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, डॉ. साताप्पा खरबडे आदी उपस्थित होते.
शहरातील उकाडे मळा, जाधव मळा व कानडी मळा या विकसित होणाऱ्या उपनगरांमध्ये बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या भागात तातडीने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नीलेश देसाई | लासलगाव निफाड तालुक्यात अनेक गावांमध्ये बिबट्याची दहशत जाणवत आहे. तालुक्यात जवळपास ३०० पेक्षा अधिक बिबटे असण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. बिबटे जेरबंद करण्यासाठी जवळपास १० गावांमध्ये वनविभागाच्या वतीने पिंजरे लावण्यात आले आहे. आतापर्यंत महिनाभरात फक्त ४ बिबटे जेरबंद झाले आहे. दररोज कुठेतरी बिबट्याचे दर्शन होत असल्याने अनेक शेतकरी धास्तावले आहे. रात्रीचे बिबट्याच्या भीतीमुळे शेतीची मशागत बऱ्याच ठिकाणी बंद करण्यात आली आहे. निफाड तालुक्याच्या पूर्व भागात अनेक गावांमध्ये बिबट्या नजरेस येत असल्याने अनेकांना धडकी भरली आहे. वन विभागाच्या वतीने अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात आलेले आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने देवगाव, विंचूर ब्राह्मणगाव विंचूर, करंजगाव, तारूखेडले, वनसगाव, करंजी खुर्द, उगाव, रानवड या गावांमध्ये बिबटे दिसून आल्याने वनविभागाच्या वतीने तेथे पिंजरे लावण्यात आलेले आहेत. करंजगावला बुधवारी द्राक्ष बागेत एक बछडा आढळून आला. वनविभागाने बछड्याची मादीबरोबर भेट घडविण्यासाठी पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. निफाड तालुक्यात महिनाभरात बिबट्याचे पाच शेतकऱ्यांवर हल्ले झाले. ते जखमी झाले होते. यात देवगावला दोन, पिंपळगाव निपाणीत एक, खरेवाडी येथे एक तर सोनगावला एक हल्ला झाला आहे. यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. विजय दोंदे , वनरक्षक विंचूर तालुक्यातील अनेक भागांत दिवसाऐवजी रात्रीची वीज दिली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शेतीसाठी रात्री वीजपुरवठा होत आहे. त्यात बिबट्याची दहशतीमुळे शेतात जाणे अवघड झाल्याने शेती कशी करायची असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांपुढे आहे. यामुळे रात्रीचा वीज पुरवठा बंद करून दिवसा करण्याची मागणी केली आहे. Q. निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबटे आढळत आहेत? A. बिबटे यांच्यासाठी सुरक्षित आणि लपन क्षेत्र तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे संख्या अधिक आहे. Q. तालुक्यात बिबट्यांचा बंदोबस्त कसा करणार? A. जिथे शेतकऱ्यांची मागणी असेल तिथे पिंजरे लावले जाणार. Q. पकडण्यात आलेले बिबटे कुठे ठेवले जातात A. पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालेले बिबटे नाशिक म्हसरूळ येथे वन्यजीव उपचार केंद्र या ठिकाणी ठेवले जातात.
वणी-सापुतारा महामार्गावर वाढले अपघातांचे प्रमाण:उपाययाेजना न झाल्यास रास्ता राेकाेचा इशारा
रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांनी अतिक्रमण करत या मार्गाचा गळा आवळला आहे. रस्त्याची रुंदी कमी झालेल्या या महामार्गावर बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या गंभीर परिस्थितीबाबत वणीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी बुधवारी प्रांत व सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधले. जगदंबा पेट्रोल पंपापासून खंडेराव मंदिर कॉर्नरपर्यंत व पुढे संगमनेर फाटा ते सापुतारा रस्त्यादरम्यान वारंवार अपघात होत आहे. नुकतेच एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. याआधीही अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहे. या मार्गालगत किराणा दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, बांधकाम साहित्य विक्री केंद्रे, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ व शासकीय कार्यालये असल्याने पादचाऱ्यांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरत आहे. हा महामार्ग टोल रस्ता असूनही रस्ता दुभाजक, पथदिवे, साईड पट्टे, रस्ता चिन्हे व गतीरोधकांची पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी व अपघातांना आमंत्रण मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी तातडीने रस्ता दुभाजक, पथदिवे, साईड पट्टे व आवश्यक ठिकाणी गतीरोधक बसवावेत व पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तात्काळ उपाययोजना न झाल्यास वणी–सापुतारा महामार्गावर रास्ता रोको छेडण्याचा इशारा या वेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
उमराणे, नाशिक चांदवड तालुक्यातील मालसाने येथे नव्याने उभारलेल्या णमोकार तीर्थाची प्राणप्रतिष्ठा तसेच महामस्तकाभिषेक महोत्सव ६ ते २५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून ४०० पेक्षा जास्त दिगंबर जैन साधू पदविहार करून येथे पोहोचत आहेत. त्यासाठी मुंबई येथील चातुर्मास करून युगलमुनीश्री अमोघकीर्तीजी व मुनीश्री अमरकीर्तीजी गुरुदेव नाशकातून पदविहार करीत णमोकार तीर्थ येथे पोहचत आहे. त्यांच्यासाठी नाशिक ते णमोकार तीर्थ अशी ५० किलोमीटरची स्वागत यात्रा शुक्रवारी (दि. १९) काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जैन धर्मात एवढी मोठी स्वागत यात्रा पहिल्यांदाच काढण्यात येणार आहे. णमोकार तीर्थ पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव समितीतर्फे युगल मुनीश्रींचे भव्य स्वागत अनोख्या पध्दतीने करण्यात येणार आहे. ही स्वागत यात्रा आडगाव येथून शुक्रवारी (दि. १९) सुरू होऊन २१ ला रोजी णमोकार तीर्थ येथे समाप्त होणार आहे. या यात्रेच्या ५० किमीच्या मार्गात ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात येईल. १०८ फूट लांब धर्मध्वजा, गुरुरथ, चालता फिरता मंडप, युवाइंद्रसहित अनेक गोष्टींचा सहभाग असेल. ठिकठिकाणी नाशिकची कला, संस्कृती दाखविणारे विविध प्रकारचे भक्तिनृत्यही सादर होणार आहे.जैन समाजाच्या परंपरेप्रमाणे १ ते२ किमीची स्वागत यात्रा काढली जाते, परंतु पहिल्यांदाच ५० किमी लांब स्वागत यात्रा काढण्यात आली आहे. प्रथमच युगल मुनीश्री हे णमोकार तीर्थ येथे होणाऱ्या जैन कुंभमेळा म्हणजेच प्राणपतिष्ठा समारोहाचे मुख्य मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. ते १२ वर्षांनंतर प्रथमच येथे येणार आहेत. त्यांच्या आगमनाने येथील सर्व भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ स्वागत यात्रा काढण्यात येत आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष संतोष पेंढारी आणि संयोजक नीलम अजमेरा यांनी दिली. या यात्रेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून गुरुदेवांचे स्वागत करावे, असे आवाहन स्वागत समितीतर्फे प्रमोद लोहाडे, राहुल कासलीवाल, वैभव अजमेरा, भरत ठोळे, अतुल लोहाडे यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. मुनीश्री अमरकीर्ती मुनीश्री अमोघकीर्ती या स्वागत यात्रेत पेठ येथील आदिवासी नृत्य, नाशिक ढोल, सायकलिस्ट पथक, लेडीज बॅण्ड, पोलिस बॅण्ड, चांदवड येथील बाल वारकरी पथक आपापल्या कला सादर करणार आहेत. याचबरोबर क्रेनद्वारे पुष्पवृष्टी, घोटी येथील महिलांचे लेझीम नृत्य, मालेगाव येथील महिलांद्वारे तीन पावली, लासलगांव येथील महिलांद्वारे विशेष प्रस्तुती करण्यात येणार आहे. वडाळीभोई येथील महिलांद्वारे वारीयात्रा आदी विविध आयोजन केले जाणार आहे.
देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या रथ मिरवणुकीनंतर शहरातील रस्ते, चौक व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साचला होता. मात्र नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने तत्काळ पुढाकार घेत रात्री व पहाटे पाच वाजेपासून विशेष स्वच्छता मोहीम राबवून दोन टन कचरा जमा करीत शहर स्वच्छ केले. यात्रोत्सवामुळे शहरात पंचवीस हजारावर भाविकांनी हजेरी लावल्याने शहरात मोठी गर्दी झाली होती. रथ मिरवणूकीत ठिक ठिकाणी अन्नदान महाप्रसाद, चहाचे वाटप करण्यात येत होते. तर मिरवणुकीत कागदी तुकड्याच्या फवारा उडविण्यात ये असल्याने रथ मार्गात मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. नगरपरिषद स्वच्छता विभागाच्या चाळीस महीला व दहा पुरुषांनी लागलीच राञी अकरा वाजेपर्यंत तर सकाळी पाच वाजेपासून सनऊ वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम राबवित कचरा साफ केला. या मोहीमेत तीन घंटा गाड्या व दोन टँक्टर भरुन अंदाजे दोन टन कचरा जमा करण्यात आला. रथोत्सव पार पडल्यानंतर काही तासांतच नगर परिषदेचे सफाई कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरत मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठ परिसर आणि मंदिर परिसरात झाडू, फावडे व कचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.नगर परिषदेच्या या तत्पर कारवाईमुळे अवघ्या काही तासांत शहर पुन्हा स्वच्छ व सुस्थितीत आले. सार्वजनिक कार्यक्रमानंतर स्वच्छता राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असली तरी पालीकेच्या तत्पर कागदी फवारे मोठ्या प्रमातात उडवले गेल्याने ते लहान लहान तुकडे गोळा करण्यासाठी खूप त्रास झाला. यात्राकाळात रोज २८ कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता यात्रोत्सव काळात १५ दिवस दररोज सकाळी व सायंकाळी २२ महिला व ६ पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने यात्रा परिसरात स्वच्छता करण्यात येत आहे. यासाठी दररोज याञेत घंटागाडी फिरणार आहे. सार्वजनिक शौचालयाचीही दररोज स्वच्छता करण्यात येत आहे. व्यावसायिकांनी आपापल्या दुकानाजवळ डसबीनमध्ये कचरा टाकावा नगरपरिषद घंटागाडी दररोज कचरा उचलेल. यात्रेत स्वच्छता राहील तसेच नागरिकांनी याञेत स्वच्छता ठेवावी व प्लस्टीकचा वापर टाळावा, असे आवाहन मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी केले आहे.
कल्पकतेला वाव:बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षण अलार्म प्रकल्प ठरला लक्षवेधी
येथील शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शालेय विज्ञान प्रदर्शनात अत्याधुनिक आणि समाजोपयोगी प्रकल्प सादर करत विज्ञान हे वरदान आहे हा संदेश प्रभावीपणे दिला. कांदा साठवण क्षमतेचे संरक्षण, बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी अलार्म, व्हॅक्यूम ट्रेन हायपरलूप, पूर इशारा प्रणाली, ड्रिप सिंचन व्यवस्था तसेच बोअरवेल चाइल्ड रेस्क्यू सिस्टिम अशा नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी प्रदर्शन विशेष ठरले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने शरद पवार इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित ‘टेक्नोवेशन–९’ या शालेय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (दि. १७) करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी कार्यकारी संचालक बी. एन. शिंदे, दीपक झाल्टे, प्राचार्य जे. एल. पटेल, विज्ञान विभाग प्रमुख अविनाश लांडगे आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारी विविध विज्ञानाधारित उपकरणे सादर केली. स्मोक अब्सॉर्ब मशीन, ऑटोमॅटिक पार्किंग मशीन, ऑटोमॅटिक रायटिंग मशीन, इको फ्रेंडली ग्रीन हायवे, कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प, वॉटर प्युरिफायर, सोलर कार, सोलर इरिगेशन, स्वयंपाकघरातील आग नियंत्रण यंत्रणा, नैसर्गिक आपत्ती अलार्म अशा अनेक प्रकल्पांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात शालेय बालवैज्ञानिकांच्या विज्ञान दिंडीने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे शोध मानवकल्याणासाठीच वापरण्याची तसेच निसर्ग व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची शपथ घेतली. कार्यकारी संचालक बी. एन. शिंदे आणि अविनाश लांडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विज्ञानाचा उपयोग समाजासाठी उपयुक्त ठरेल, अशा दिशेने संशोधन करण्याचे आवाहन केले. प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले. प्रदर्शनास संस्थापक डॉ. जे. डी. पवार, शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, अध्यक्ष शैलेश पवार, सचिव अनुप पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. अशी काम करणार हल्ल्याचा अलार्म देणारी सिस्टीम अलीकडे बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावण्याचे प्रकार वाढलेले असतांना येथील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात बिबट्याचा हल्ला रोखण्यासाठी अलार्म सिस्टम उपकरण तयार केले. यामध्ये बिबट्याची प्रतिकृती दिसल्यावर तसेच त्याच्या पावलांच्या साईजचे ठसे उमटल्यावर तो अलार्म वाजेल. एक इमर्जन्सी लाईट लागेल व मनुष्यप्राणी सावध होऊन धोका टळेल अशी संकल्पना असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. प्रशासन हे पारदर्शक आणि लोकाभिमुख करून ते सुशासन करण्यासाठी संवाद कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी (१७ डिसेंबर) केले. तसेच ग्रामस्थ, शेतकरी व दिव्यांगाबाबत सुसंवाद आणि संवेदना असावी, असेही त्यांनी सांगितले. कन्नड येथे ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांच्या एकदिवसीय उपविभागीय स्तरावरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सेवा हमी आयुक्त किरण जाधव, कन्नड उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, तहसीलदार स्वरूप कंकाळ, डॉ. मेघा शेवगण, तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. दैनंदिन जीवनात शेतकरी बांधव, विविध प्रकारच्या नागरिक, महिला, कामानिमित्त संपर्क येत असतो. त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी संवाद कौशल्य महत्त्वपूर्ण असून आंतरिक तळमळीने ग्रामीण जनतेला मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी काम करावे यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्याचा अंगीकार करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणातून अद्ययाव तंत्रज्ञानाचा वापर, विविध शासन निर्णय, नियमावली याचा अभ्यासही असणे आवश्यक आहे. तरच नागरिकांना वेळेत सुविधा देऊ शकतो, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. सेवा हमी विधेयकाबाबत जाधव यांचे मार्गदर्शन सेवा हमी विधेयक याबाबत सेवा हमी आयुक्त किरण जाधव यांनी नागरिकांना सेवा वेळेत उपलब्ध करून देण्याची विहित कालावधी होण्याच्या आत उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच सेवा हमी विधेयकाच्या अंतर्गत होणाऱ्या अपीलाबाबत मार्गदर्शन केले. वारसा हक्क, तुकडेबंदी कायदे प्रशिक्षणातील मार्गदर्शक संजय कुंडेटकर यांनी महसूलविषयक विविध कायद्याचे मार्गदर्शन केले. यामध्ये जमीन महसूल अधिनियम १९६६ यामधील खंड दोन, तीन आणि चार यामधील असणाऱ्या विविध बाबींचे सखोल मार्गदर्शन केले. तसेच वारसा हक्क, तुकडेबंदी कायदे व यातील सुधारणा यावर मार्गदर्शन केले. आरोग्यविषयी दिला कर्मचाऱ्यांना सल्ला डॉ. शोएब मोहंमद डॉ. उल्फत परदेशी व मेघा शेवगण यांनी कर्मचाऱ्यांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करून ताणतणवाचे व्यवस्थापन करत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे .याबाबत मार्गदर्शन करून आरोग्यविषयक विविध योजनांची माहिती या कार्यक्रमात दिली. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी केले. ग्राम प्रशासनाचा कणा महाराष्ट्र राज्य प्रशासकीय यंत्रणेत ग्रामीण स्तरावर महसूल विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. यामध्ये ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि मंडळ अधिकारी (सर्कल ऑफिसर) हे दोन दुवे थेट जनतेशी जोडलेले असून, त्यांना प्रशासनाचा कणा' म्हणून ओळखले जाते. शेतीविषयक नोंदींपासून ते विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीपर्यंत या अधिकाऱ्यांवर जबाबदारी असते.
गोठ्याला भीषण आग; 8 गुरांचा जागीच मृत्यू:सिल्लोड तालुक्यातील पिरोळा येथील घटना
पिरोळा (ता. सिल्लोड) येथील गट क्रमांक ३९ मधील शेतवस्तीवर बुधवारी रात्री आठ वाजेदरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली. शेतकरी गजानन रंगराव काळे यांनी नेहमीप्रमाणे आपली जनावरे गोठ्यात बांधून घरी परतल्यानंतर काही वेळातच गोठ्याला अचानक आग लागली. आगीने काही मिनिटांतच उग्र रूप धारण केल्याने गोठ्यात बांधलेली आठ जनावरे जळून खाक झाली. परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा शर्थीने प्रयत्न करण्यात आला; मात्र आग मोठी असल्याने गोठा पूर्णपणे जळून खाक झाला आणि जनावरांना वाचवता आले नाही. मी शेतातून घरी जात असताना मला शेजारच्या शेतात आग लागल्याचे दिसले. मी तिकडे धाव घेतली तर एका गोठ्याला आग लागल्याचे आढळले. तेथील गायींचा हंबरडा ऐकून मी स्तब्ध झालो. मी लगेच गावाकडे पळत गेलो आणि शेतमालकाला माहिती दिली. -सुनील काळे
पिंप्रीजवळ दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू:मृत सोयगाव तालुक्यातील सावरखेडचे रहिवासी
सिल्लोड-भोकरदन रस्त्यावरील बुलढाणा अर्बन वेअरहाऊसच्या समोर रस्त्याच्या कडेने जाणाऱ्यास मोटारसायकलची जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्याचा बुधवारी मृत्यू झाला. या अपघाताची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सोयगाव तालुक्यातील सावरखेडा येथील भगवान पाटीलबा जंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सिल्लोड ते भोकरदन रस्त्यावर पिंपरी गावाजवळ पाटीलबा तुळशीराम जंजाळ (७५) हे आपल्या भाचीसह दुपारी एक वाजेचा सुमारास रस्त्याने जात असताना त्यांना दुचाकीने (एमएच २० एचएल ४५१५) जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मोटारसायकल चालकाविरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल दीपक इंगळे करीत आहेत.
रवळा धरणातून तलावात पाणी सोडण्याची मागणी:पाटबंधारेमंत्री विखे पाटील यांच्याकडे मागणी
रवळा धरणाच्या पाटचाऱ्यांची दुरुस्ती करून जवळा आणि जामठी येथील पाझर तलावात पाणी सोडावे, अशी मागणी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राज्याध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी पाटबंधारेमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना मुंबईत त्यांनी मंत्र्यांची भेट घेतली. रवळा येथील धरण मोठे असून पावसाळ्यात धरण भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. धरणाचे पात्र पसरट असल्याने साठलेले पाणी पाटचाऱ्यांद्वारे जवळा आणि जामठी येथील पाझर तलावात सोडल्यास परिसरातील नदी, नाले, विहिरी आणि बोअरवेलना फायदा होईल. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होईल, असे मुलतानी यांनी नमूद केले. सध्या पाटचाऱ्यांचे काम पूर्ण झाले असले तरी त्यांची दुरुस्ती करून नवीन पाटचारा तयार करावा लागेल. योग्य नियोजन करून पाणी सोडल्यास जवळा आणि जामठी तलावात पाणीसाठा वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. या कामासाठी गोदावरी पाटबंधारे विभागाकडून प्रस्ताव मागवून त्यास तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी जयप्रकाश चव्हाण उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांनी व्यवस्थापकीय संचालकांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.
शफेपूर भागात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात सोमवार, १५ तारखेला दुसऱ्या कीर्तनात मोटे महाराजांनी कीर्तन पुष्पगुच्छ ओवताना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, देव आणि संत यांच्यावर कुणाचीही सत्ता चालत नाही. हे दोघेही अलौकिक आहेत. मात्र सामान्य माणसाने संसार करताना फक्त हरीचे नाम घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मोटे महाराज म्हणाले, हरिनामात इतकी ताकद आहे की ते संकट क्षणार्धात नाहीसे करते. तुकाराम महाराजांच्या अभंगाचे विश्लेषण करताना मोटे महाराज म्हणाले, तुकाराम महाराजांनी संसार सोडून परमार्थ स्वीकारला. मागे वळून पाहिले नाही. परमार्थात लागल्यानंतर अनेकजण संसाराच्या मायेत अडकतात. मात्र तुकाराम महाराज शूर, वीर आणि भक्तीवर स्थिर राहिले. हे संतच करू शकतात. आपल्याला ते शक्य नाही. म्हणून कामामध्ये काम म्हणा राम राम. पुढे बोलताना मोटे महाराज म्हणाले, माउलींनी समाधी घेऊन पृथ्वीवर विजय मिळवला. एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेऊन पाण्यावर विजय मिळवला. मुक्ताईने तेजावर, जनार्दन स्वामींनी वायूवर आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आकाशावर विजय मिळवला. म्हणून आमचे संत अलौकिक आहेत. कीर्तनाचे प्रायोजक किसन सयाजी मोकासे, सुधाकर किसन मोकासे आणि राजू किसन मोकासे यांनी महाराजांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. या वेळी वीणेकरी सोपान महाराज मोकासे, हार्मोनियमवादक एकनाथ महाराज शेलार, मृदंगाचार्य महेश महाराज कावले, राजू महाराज मोकासे, शांताराम महाराज ओपळकर, तुकाराम मोकासे, नंदू महाराज, चंद्रभान महाराज नवले, गोविंद महाराज सुरडकर, गोकुळ महाराज सुरडकर आणि मैनाजी मोकासे उपस्थित होते. वसाडी, रामनगर, हस्ता, मेहेगाव, तपोवन, नाचनवेल, सारोळा, गोरपिंपरी, नादरपूर, पिंपरखेड, चिंचोली, नागापूर, करंजखेड, नेवपूर आदी गावांतील भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने हजेरी लावली.आज १८ रोजी संग्रामबापू भंडारे यांचे कीर्तन साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत होईल. महाराजांनी सांगीतले रामनामाचे महत्त्व शेवटच्या क्षणीही नामाशिवाय पैलतीरी जाता येत नाही. रामनामाचे महत्त्व सांगताना त्यांनी उदाहरण दिले की, रामनामाने जड दगड पाण्यावर तरंगतो, आपण तर माणसं आहोत, मग आपल्याला पैलतीरी का नेता येणार नाही?
धर्मादाय आयुक्तांचे बनावट पत्र व नोटरी करारनामा तयार करून संत संताजी महाराज जगनाडे मंदिरासह मिळकतीची १ कोटी ६१ लाखांत विक्री करण्यासाठी सौदा करण्यात आला. ट्रस्टचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ चौधरी, माजी सचिव वसंत खैरनार यांनी एका व्यावसायिकासोबत हा सौदा केला. त्यांनी खरेदीपूर्वी आगाऊ रक्कम घेतली. मात्र, मंदिराची खरेदी न झाल्याने खरेदीदाराने मिळकतीवर कब्जा करून मंदिराला कुलूप ठोकले. मंदिरातील अतिरिक्त हॉलची जागा २ वर्षांसाठी भाडेकरू नाविद अख्तर खुर्शीद अहमद यांना भाडे कराराने दिली. २०२१ ला करार संपला. याच व्यावसायिकाला विक्रीसाठी पदाधिकाऱ्यांनी नोटरी करारनामा करून दिले. याप्रकरणी ट्रस्टचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ चौधरी यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता याप्रकरणी दुसराही गुन्हा दाखल झाला आहे. जागा विक्री व्यवहारात आपली ७१ लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी वसीम अख्तर खुर्शिद अहमद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. लेखी जबाबानंतरही मंदिरावर कब्जा कायम बेकायदा कब्जा हटवून मंदिर समाजबांधवांच्या ताब्यात मिळावे, या मागणीसाठी मधुकर चौधरी व लक्ष्मण सूर्यवंशी यांनी ३० जून २०२५ रोजी समाजबांधवांचा मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. या वेळी दुकानदार वसीम अख्तर याने महिनाभरात जागा खाली करून देण्याचा लिखित जबाब पोलिसांना दिला. मात्र कब्जा कायम ठेवला असल्याचे दिसून आले. ८ वर्षांपूर्वीच मुदत संपली संचालक मंडळाची मुदत २०१७ मध्ये संपली आहे.नवीन संचालक मंडळ नाही. भाड्याचाही हिशेब दिलेला नाही. - रमेश करंकाळ, माजी संचालक. तेली समाज न्यास. भाडेकरूने मंदिराला लावले कुलूप ८ डिसेंबर रोजी संताजी महाराज जयंतीला हे मंदिर उघडले गेले नाही. समाजबांधवांतील कुणाकडेच मंदिराची चावी नव्हती. चौकशीअंती मंदिराला भाडेकरू व्यावसायिकाचे कुलूप असल्याचे समाज बांधवांना समजले. या वेळी मंदिरावर बेकायदा कब्जा झाल्याचे उघडकीस आले. दुसरा स्टॅम्प करून मंदिर घेतले ताब्यात नोटरीत खरेदीदाराने एक कोटी रुपये आधी व उर्वरित ६१ लाखांची रक्कम खरेदी खताच्या दिवशी देण्याचे ठरले. मात्र ३० जून २०२२ पर्यंत व्यवहार पूर्ण झाला नाही. त्यामुळे ५ ऑगस्ट २०२५ रोजी दुसरा स्टॅम्प करून मिळकत खरेदीदाराच्या कब्जात दिली गेली. नोटरीद्वारे सौदा मंदिर मिळकत विक्रीच्या उद्देशाने नोटरी करारनामा झाला. टप्प्याटप्प्याने रक्कम सुमारे एक कोटीपर्यंत पूर्ण करून देताना उर्वरित ६४ लाख रुपये रक्कम खरेदी खताच्या दिवशी देण्याचे ठरले. हे आहे बनावट पत्र २२ डिसेंबर २०२१ रोजी मिळकत विक्रीसाठी निविदा मंजूर करण्यात आली असे धर्मादाय आयुक्तांचे बनावट पत्र तयार करण्यात आले.यामुळे व्यवहार बेकायदा असल्याचे स्पष्ट झाले. मंदिर विक्री बेकायदा समाज मालकीचे मंदिर बेकायदा विकण्याचा प्रयत्न झाला आहे. यासंबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - लक्ष्मण सूर्यवंशी, ट्रस्टचे आजीव सदस्य व फिर्यादी. पैसे घेऊनही ठरल्याप्रमाणे व्यवहार ३० जून २०२२ पर्यंत झाला नाही. त्यामुळे खरेदीदार व्यावसायिकाचा मंदिरासह मिळकतीवर कब्जा असून मंदिराला कुलूप लावण्यात आले आहे.
माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी ‘आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि ऋषिकेश जैस्वाल हेच पक्ष चालवत असून, पक्षात सन्मान नसेल तर आम्हाला पदमुक्त करा,’ अशी तक्रार केल्यानंतर पालकमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत या वादाबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यानंतर बुधवारी किशनचंद तनवाणी आणि माजी महापौर विकास जैन यांना पक्षाच्या मुख्य समन्वय समितीत स्थान दिले आहे. दरम्यान, मनपाचे शिवसेनेचे नेतृत्व मीच करणार आहे. निवडणुकीतल्या यशापयशाची जबाबदारीदेखील माझीच असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. याबाबत पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले की, तनवाणी यांनी काही आक्षेप नोंदवले होते. निवडणुकीत सर्वांना सोबत घेत काम करायचे आहे. त्यामुळे समन्वय समिती एकत्र राहून युतीची बोलणी करणार आहे. गुरुवारी आमची भाजपसोबत पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत मी आणि भाजपकडून अतुल सावे हेदेखील बैठकीत सहभागी होणार आहेत. आता तनवाणी समर्थकांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे तनवाणी गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झाले आहेत. मुख्य समन्वय समितीत ते सहभागी होणार असल्यामुळे युतीच्या चर्चेतही महत्त्वाची भूमिका असेल. यापूर्वी अनेक निवडणुका त्यांनी हाताळल्या असल्यामुळे त्यांच्या समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे. विशेषत: तनवाणी यांच्यासोबत ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्या समर्थकांना आता उमेदवारी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमच्या पतंग चिन्हावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मतदानाला ४८ तास बाकी असताना पक्षाचा आणि चिन्हाचा प्रचार करता येत नाही, असा नियम आहे. त्यामुळे हिंदू धर्मातील मकरसंक्रांत मोठा सण १४ जानेवारीला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पतंग उडवतात. त्यामुळे एमआयएमचे पतंग चिन्ह गोठवण्यात यावे, अशी मागणी शिरसाट यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. शिरसाट यांनी दिलेल्या तक्रारीत, एमआयएम राज्यात अनेक ठिकाणी निवडणूक लढवत आहे. राज्यात अनेक शहरात पतंग उडवल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम मतदारावर होऊ शकतो. १५ जानेवारी रोजी मतदान आहे, तर १४ जानेवारी रोजी राज्यात पतंगोत्सव असल्यामुळे त्याचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे एमआयएमचे चिन्ह गोठवण्यात यावे. इम्तियाज जलील यांनी ही मागणी हास्यास्पद असल्याचे सांगत ती मागणी फेटाळून लावली. एमआयएमचे शहराध्यक्ष शारेख नक्षबंदी म्हणाले की काँग्रेसचे चिन्ह पंजा आहे. मग आपल्या हाताचे काय करायचे, हातावरच्या घड्याळाचे काय करायचे, कमळाचे फूल हे चिन्ह आहे त्या कमळाचे काय करायचे? मतांच्या ध्रुवीकरणासाठी मांडला मुद्दा छत्रपती संभाजीनगरात हिंदू-मुस्लिम यांभोवतीच निवडणुकीचा प्रचार असतो. त्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी आम्हीच आहोत हे दाखवण्यासाठी. त्याचबरोबर पुन्हा शहरात हिंदू, मुस्लिम मुद्द्याभोवती निवडणूक फिरवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे उद्धवसेना आता हिंदू-मुस्लिम या वादात पडणार नसल्यामुळे शिंदेसेनेने पुन्हा याच मुद्द्यावर निवडणूक नेण्यासाठी अशी मागणी केल्याचे मानले जाते.
मविआतील ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षात बेबनाव झाला असून या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते विचलित झाले आहेत. यामुळे दोन्ही पक्षांतील राज्यातील काही नेते आमच्या संपर्कात असून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु आम्हीच त्यांना वेटिंगवर ठेवले आहे, असा गौप्यस्फोट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फुलंब्रीत केला. २०११ पूर्वी जे नागरिक गावात किंवा शहरात अतिक्रमण करून घरे बांधून राहत असतील अशा नागरिकांची घरे त्यांच्या नावावर केली जातील, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महायुतीचे सरकार महाराष्ट्रात आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना आम्ही चालू ठेवणार आहोत. या वेळी आमदार संजय केणेकर, फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, फुलंब्री भाजप शहराध्यक्ष योगेश मिसाळ उपस्थित होते. विरोधकांनी चर्चेला यावे : रावसाहेब दानवे विकास झाला नाही असे म्हणणाऱ्यांनी समोरासमोर चर्चा करावी. विरोधकांना पळता भुई थोडी होईल. विरोधक केवळ टीका करण्यात धन्यता मानत आहेत, तर आम्ही विकासाला प्राधान्य देत आहोत, असे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
नागपूर महापालिकेसाठी भाजपच्या ३ हजार इच्छुकांनी अर्ज नेले. त्यापैकी १,४८९ अर्जदारांनी भरून दिले. काँग्रेसकडून १ हजार, शिंदेसेनेकडून २४४ अर्जांची विक्री झाली. उबाठात ३५० इच्छुकांनी अर्ज केले. भाजपच्या विधानसभानिहाय मुलाखती सुरू आहेत, तर काँग्रेसच्या मुलाखती १९ व २० रोजी आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत २० डिसेंबरनंतर जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू होतील. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप १२०, शिंदेसेना २०, तर राष्ट्रवादी ११ असा जागावाटपाचा फार्म्युला राहू शकतो. महाविकास आघाडीतही काँग्रेसचा वाटा किमान ९० ते १०० जागांचा राहण्याची शक्यता आहे. भाजपने महिला, एससी व एसटीसाठी १००० रुपये आणि सर्वसाधारणसाठी २ हजार रुपये किंमत ठेवली होती. २० डिसेंबर रोजी भाजपतील इच्छुकांच्या मुलाखती संपल्यानंतर महायुतीतील घटकपक्षांसोबत युतीबाबत बोलणी करू, असे भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. भाजपच्या कोषागारात अर्ज विक्रीतून नक्की किती रक्कम जमा झाली याची माहिती मिळू शकली नाही. अजितदादांच्या राष्ट्रवादीला हव्या किमान २० जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर म्हणाले, आमच्या मर्यादांची जाणीव आहे. त्यामुळे आम्ही क्षमतेनुसारच जागा मागू असे सांगितले. महापालिकेत १५१ जागा आहेत. त्यापैकी १५% म्हणजे किमान २० जागा राष्ट्रवादीला सोडाव्यात, अशी आमची मागणी राहील. तिथेही काँग्रेस निवडून येते किंवा आली अशा जागा आम्हाला द्याव्यात अशी आमची मागणी राहील, असे अहिरकर यांनी सांगितले. आम्ही १०० टक्के महायुतीत राहणार आहेत. काँग्रेसच्या मुलाखती १९ पासून सुरू होण्याची शक्यता भाजपला किमान टक्कर देऊ शकेल अशी काँग्रेसच आहे. काँग्रेसच्या १ हजार अर्जांची विक्री झाली. काँग्रेसने अनुसूचित जाती व जमातीसाठी ५ हजार आणि सर्वसाधारणसाठी ७५०० रूपये किंमत ठेवली होती. काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती देवडिया काँग्रेस भवनमध्ये १९ व २० डिसेंबर रोजी होणार असल्याचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले. काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती संपल्यानंतर २५ डिसेंबरपर्यंत महाविकास आघाडीचा निर्णय होईल, असे ठाकरे यांनी सांगितले. श.प. राष्ट्रवादीच्या १७५ अर्जांच्या विक्री राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे म्हणाले, मेरिटनुसार उमेदवारी मागणार आहे. किमान २५ जागा आम्ही मागू असे स्पष्ट केले. आतापर्यंत १७५ अर्ज विक्री झाली आणि ८० जणांनी डी. डी. सह जमा केले. २५०० रुपये सर्वसाधारणसाठी आणि १५०० रुपये अनुसूचित जाती व जमातीसाठी किंमत होती. १०० सर्वसाधारण आणि ७५ अनुसूचित जाती व जमातीसाठीच्या अर्जांची विक्री झाली. येत्या शनिवारी, २० डिसेंबरपासून मुलाखती तर २१ आणि २२ डिसेंबर रोजी जागावाटपासाठी वाटाघाटी होतील असे पेठे यांनी सांगितले. उबाठात आतापर्यंत इच्छुकांचे ३५० अर्ज आले आहेत. शिंदेसेनेची किमान २५ जागांची आहे अपेक्षा शिंदेसेनेचे नागपूर लोकसभा जिल्हाप्रमुख सूरज गोजे यांनी २४४ अर्ज गेले. अर्जाची किंमत ५०० रुपये ठेवली होती. या हिशेबाने १ लाख २२ हजार रुपये जमा झाले. शिंदेसेनेकडून लढण्यास इच्छुक. २३५ भरून आले. त्याची स्क्रुटिनी सुरू आहे. १२५ गांभीर्यपूर्वक लढण्यास तयार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्यास शिंदेसेनेकडून लढण्यास इच्छुक ४५ जणांची यादी तयार आहे. किमान २५ जागा मागू, असे सूरज गोजे यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात राजकीय उलथापालथ सुरूच असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे समर्थक, दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर आहेत. दोन दिवसांत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्यासाठी त्यांनी काही निवडक कार्यकर्त्यांना मुंबईत येण्यास सांगितले. मागील चार महिन्यांत मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिंदेसेनेला सेनगाव व हिंगोली तालुक्यात मोठे बळ मिळाले. त्यानंतर पालिका निवडणुकीच्या तोंडावरच शरद पवार गटाच्या काही माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. याशिवाय शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह माजी नगरसेवकांनी अजित पवार गटात प्रवेश केला. दरम्यान, आता काँग्रेसच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. आमदार डॉ.सातव यांचे काही कार्यकर्ते बुधवारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, याबाबत सातव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. स्थानिक काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसला उभारी देण्याचे काम आमदार सातवांकडून केली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र जिल्ह्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाले. या कलहातून अनेकांनी पक्षाला रामराम ठोकला. विशेष म्हणजे वरिष्ठ पातळीवरूनही डॉक्टर सातवांना विरोध होऊ लागला होता. मात्र गांधी घराण्याशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेऊन त्यांना वरिष्ठ नेत्यांनीही खुला विरोध केला नाही. तूर्तास प्रवेशाबाबत मोठी गुप्तता तूर्तास या पक्षप्रवेशाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. यासंदर्भात आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. विरोधानंतरही काँग्रेसकडून दुसऱ्यांदा मिळाली संधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे खंदे समर्थक असलेले माजी खासदार स्व. राजीव सातव यांच्या निधनानंतर पक्षाने सातव घराण्याचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना विधान परिषद सदस्यपदाची संधी दिली. त्या वेळी त्या बिनविरोध विजयी झाल्या. त्यानंतर दुसऱ्या वेळी काँग्रेस पक्षांतर्गत विरोध असतानाही राहुल गांधी यांनी त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली. मात्र, आता त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. तसेच विकासकामांसाठी वाढीव निधी मिळत नसल्याची खदखद त्यांनी काही दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांना बोलून दाखवली होती. कामे होण्यासाठी तसेच विकास कामांसाठी निधी मिळवण्यासाठी सत्तेत राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांचा राजीनामा काँग्रेस पक्षाने मंजूर केल्यास गुरुवारी (१८ डिसेंबर) भाजपत प्रवेश होईल, अन्यथा दोन दिवसांनी पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला जाणार आहे.
शहरातील जटवाड्याजवळील ओहर गावात जमिनीच्या वादातून एका कुटुंबावर ११ जणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला चढवल्याची थरारक घटना बुधवारी दुपारी घडली. लोखंडी रॉडसह केलेल्या मारहाणीत गावचे माजी सरपंच दादा सांडू पठाण (६९) यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा माजेद व जुनैद आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात ११ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. एकास अटक केली असून इतर १० आरोपी पसार झाले आहेत. गावातील गट क्रमांक १९८ मधील साडेचार एकर जमिनीच्या मालकी हक्कावरून दोन कुटुंबांत २०२२ पासून वाद आहे. मृत दादा पठाण यांच्याकडे या जमिनीचा कायदेशीर ताबा असून महसूल दप्तरी तशा नोंदीही आहेत. असे असतानाही, बुधवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास आरोपींनी पठाण कुटुंबाशी वाद उकरून काढला. आरोपींच्या दुकानांची तोडफोड या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली असून मृत कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी आरोपींच्या दुकानांची तोडफोड केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. हर्सूल पोलिस ठाण्याच्या निरीक्षक स्वाती केदार, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक पोलिस आयुक्त मनोज पगारे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला. लोखंडी रॉड, शस्त्रांनी आजोबांची हत्या केली मी माझ्या आजोबांच्या घरी आलो होतो. अचानक दुपारी साडेबाराच्या सुमारास आम्ही घरी असताना आरोपी दुचाकींवर आले. त्यांच्या हातात लोखंडी रॉड व शस्त्रे होती. त्यांनी थेट मारहाण सुरू केली. काही कळायच्या आत आरोपींनी आजोबांची हत्या केली. -मोईन पठाण, मृताचा नातू
वाल्मीक कराडचा जामीन फेटाळला:जामिनाचा अर्ज मागे न घेतल्याने औरंगाबाद खंडपीठाने फटकारले
मस्साजोगचे (जि. बीड) सरपंच संतोष देशमुख खून खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मोठा धक्का दिला. न्यायालयाने कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायमूर्ती सुशील घोडेस्वार यांच्यासमोर बुधवारी (१७ डिसेंबर) कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लक्षवेधी ठरली होती. शुक्रवारी ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते यांनी कराडतर्फे प्रदीर्घ युक्तिवाद केला होता. त्यांनी पोलिसांच्या तपासावर आणि अटकेच्या कायदेशीर प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, मंगळवारी मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे आणि फिर्यादीचे वकील ॲड. नितीन गवारे यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडली होती. त्यांनी पुराव्यांच्या आधारे आरोपीचे सर्व दावे खोडून काढले. तर मुख्य सरकारी वकील गिरासे आणि फिर्यादीचे वकील ॲड. गवारे यांनी पुराव्यांच्या आधारे आरोपीचे सर्व दावे खोडून काढले आणि ‘मकोका’अंतर्गत झालेली कारवाई योग्य असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. कारागृहातील मुक्काम लांबला बुधवारच्या सुनावणीत कराडच्या वकिलांनी १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या दोषनिश्चितीला स्थगिती देण्याचे आदेश बीडच्या विशेष न्यायालयाला द्यावेत, अशी विनंती केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने हे प्रकरण जामीन देण्यायोग्य नसल्याचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने कराडच्या वकिलांना विचारले की, तुम्ही जामीन अर्ज मागे घेता की आम्ही आदेश पारित करू?’ वकिलांनी आदेश देण्याची विनंती केल्यानंतर न्यायालयाने वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला. या निकालानंतर आता बीडच्या विशेष न्यायालयात १९ डिसेंबर रोजी या प्रकरणातील दोषनिश्चितीची प्रक्रिया पार पडणार असून, वाल्मीक कराडचा कारागृहातील मुक्काम आता लांबला आहे. ‘दिलासा मिळताना दिसतोय’ बुधवारी (१७ डिसेंबर) सुनावणीनंतर, ‘आता दिलासा मिळण्यास सुरुवात झाली,’ अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी खंडपीठाबाहेर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
मुंबईत राष्ट्रवादीचे ‘मालिक’ नवाबच:अजित पवारांचा पक्ष मुंबई मनपा मलिकांच्या नेतृत्वातच लढणार
भाजपने टाकलेली अट स्पष्टपणे नाकारत अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष मुंबई मनपा निवडणूक माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वातच लढणार आहे. त्यामुळे मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवाबच मालिक असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, मलिक यांच्या कन्या, आमदार सना मलिक यांनी भाजप नेते, मंत्री आशिष शेलार यांच्या वक्तव्यांना प्रत्युत्तर दिले आहे. “आरोप झाले म्हणजे कुणी गुन्हेगार ठरत नाही. आशिष शेलार वकील असूनही अशी विधाने कशी करतात? संविधानानुसार जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत नवाब मलिक निर्दोषच आहेत,’ असे त्या म्हणाल्या. राज्यात उद्धव ठाकरेंचे सरकार असताना नवाब मलिक मंत्री होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मलिक यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदीचा आरोप केला होता. त्यामुळे मलिक तुरुंगात गेले होते. तोच मुद्दा पुढे करत शेलार यांनी सांगितले की, मलिक यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीशी आम्ही युती करणार नाही. त्यावर अजित पवारांनी मलिक यांना बाजूला हटवण्यास नकार दिला. सूत्रांनी सांगितले की, बुधवारी तीन तासांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर पक्षाने दोन स्वतंत्र अहवाल तयार केले आहेत. युती झाल्यास जागावाटपाचा फॉर्म्युला. युती न झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी. हे दोन्ही अहवाल लवकरच अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसमोर ठेवले जाणार आहेत. भाजपला माघार घेणे अशक्य उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असताना नवाब मलिकांवर फडणवीसांनी तुफान हल्ला केला होता. मलिक यांचे देशद्रोही लोकांशी कनेक्शन आहे, असा आरोप भाजपकडून केला जात होता. त्या आरोपापासून माघार घेणे भाजपला आता अशक्य आहे. मुंबईमध्ये ते अत्यंत महागात पडू शकते. म्हणूनच मलिक यांना सोबत घेण्यास आशिष शेलार यांच्यासह भाजपचे सर्व स्थानिक पदाधिकारी कडाडून विरोध करत आहेत. सना मलिक असतील अधिक सक्रिय सूत्रांनी सांगितले की, गेल्या महिनाभर उमेदवार अर्ज आणि मुलाखतीसाठी नवाब मलिक यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वातच अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष मुंबई मनपा लढणार आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आणि रणनीती ठरवण्यात नवाब मलिक यांच्या तुलनेत त्यांच्या कन्या आमदार सना मलिक अधिक सक्रिय असतील. अजित पवार गटाला महायुतीबाहेर ठेवणे ही भाजपची ‘रणनीती’! मुंबईत अजित पवार गटाला सोबत न घेणे ही भाजपची रणनीती आहे. मुंबईत केवळ अणुशक्तिनगर आणि वांद्रे या मुस्लिमबहुल भागांतच अजित पवारांची ताकद आहे. मुस्लिम मतदारांचा ओढा उद्धवसेना, काँग्रेसकडे आहे. त्यात अजित पवार गट स्वतंत्र लढल्यास दलित-मुस्लिम मतांचे विभाजन होईल. त्याचा फायदा भाजप-शिंदेसेनेला मिळू शकतो, असे गणित मांडून नवाब मलिकांना पुढे केले जात आहे.
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे गोत्यात आले आहेत. ‘गृहकर्तृत्वा’मुळे त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर टांगती तलवार आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली. या निकालाने लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार कोकाटे यांची आमदारकी रद्दबातल ठरणार आहे. विधिमंडळ सचिवांनी […] The post माणिकराव गोत्यात! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सिनेअभिनेते रितेश देशमुख यांचा वाढदिवस साजरा
जळकोट प्रतिनिधी जळकोट येथील व्यंकटेश काशिनाथ गंगोत्री हा युवक गत २५ वर्षांपासून आपल्या लाडक्या अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करीत असतो . यावर्षीही १७ डिसेंबर रोजी व्यंकटेशने केक कापून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करीत आपल्या मित्रांच्या तसेच मान्यवरांच्या समवेत त्याचे लाडके अभिनेते रितेश देशमुख यांचा वाढदिवस साजरा केला . जळकोट येथील व्यंकटेश गंगोत्री […] The post सिनेअभिनेते रितेश देशमुख यांचा वाढदिवस साजरा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रवाशास मारहाण करीत रोख रकमेसह दागिने लुटले
चाकूर : प्रतिनिधी चापोली येथे लातूर-नांदेड महामार्गावर मध्यरात्री दरोडेखोरांनी प्रवाशांना मारहाण करीत लूट करून सोन्याचे दागीने व रोख रक्कम घेऊन फरार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रवाशांत भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी चाकूर येथील पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १७ डिंसेबर रोजीच्या पहाटेच्या अडीचच्या सुमारास चापोलीच्या उत्तरेस […] The post प्रवाशास मारहाण करीत रोख रकमेसह दागिने लुटले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
न्याय, हक्क आणि विकासासाठी काँग्रेसचा लढा
लातूर : प्रतिनिधी लातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनियुक्त पदाधिका-यांना माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्त नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना माजी आमदार धिरज देशमुख यांनी न्याय, हक्क आणि सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसचा लढा असल्याचे नमुद केले. या कार्यक्रमास माजी आमदार वैजनाथ शिंदे, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब […] The post न्याय, हक्क आणि विकासासाठी काँग्रेसचा लढा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्ह्यात वर्षभरात ३७ खून तर ६१ खुनांच्या प्रयत्नाच्या घटना
लातूर : विनोद उगीले जिल्ह्यात दि. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान विविध पोलीस ठाण्याच्यास् हद्दीत ३७ खुनाचा तर ६१ खुनाचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या असून जिल्हा पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी पदभार स्विकारल्या पासून गुन्ह्यांचा आलेख खालावताना दिसत आहे. मागील वर्ष २०२४ मध्ये १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर या ११ महिन्याच्या कालावधीत तब्बल […] The post जिल्ह्यात वर्षभरात ३७ खून तर ६१ खुनांच्या प्रयत्नाच्या घटना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शारदा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे होमी भाभा परीक्षेत घवघवीत यश
लातूर : प्रतिनिधी मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ व होमी भाभा रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणा-या इयत्ता सहावी व नववीसाठीच्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत शारदा इंटरनॅशनल स्कूल, लातूरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, तार्किक विचारशक्ती, प्रयोगशीलता व संशोधनवृत्ती विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. […] The post शारदा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे होमी भाभा परीक्षेत घवघवीत यश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गोल्डक्रेस्ट हायस्कूल, लातूरच्या संगीत रजनीला उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर : प्रतिनिधी येथील गोल्डक्रेस्ट हाय स्कूलच्या वतीने क्रीडा संकुल येथे दि. १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित ओपन-एअर म्युझिकल व आर्ट कॉर्नर प्रदर्शन कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संगीत रजनीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मंगलमय गणेश वंदनेने झाली. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी […] The post गोल्डक्रेस्ट हायस्कूल, लातूरच्या संगीत रजनीला उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महापालिका निवडणुकीसाठी आर. ओ. कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणुक अधिकारी श्रीमती मानसी यांनी ६ निवडणुक निर्णय अधिका-यांची निवड केली आहे. प्रत्येक निवडणुक निर्णय अधिका-यांसाठी स्वतंत्र कार्यालयाची स्थापना करण्यात आली असून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आर. ओ. कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असल्याची माहिती निवडणुक अधिकारी श्रीमती मानसी यांनी दि. १७ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली. प्रभाग […] The post महापालिका निवडणुकीसाठी आर. ओ. कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटविणार
सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या संरक्षणासाठी महायुती सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीचे सह-अध्यक्ष म्हणून महसूलमंत्री, वनमंत्री आणि मत्स्य व्यवसाय तथा बंदरे मंत्री यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री नितेश […] The post गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटविणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतींची लगबग
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून, पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची लगबग सुरु झाली आहे. दि. १७ डिसेंबर रोजी काँग्रेस भवन येथे १ ते १२ प्रभागांतील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. आज दि. १८ डिसेंबर रोजी १३ ते […] The post काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतींची लगबग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नगरपालिकेच्या गोंधळामुळे जि. प. कायद्यात दुरूस्ती!
अपिलाची तरतूद रद्द, निवडणूक अधिका-याचा निर्णयच अंतिम -राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी न्यायालयीन अपिलांमुळे नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवू नये म्हणून महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १४ (२) मध्ये सुधारणा करण्यास बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. […] The post नगरपालिकेच्या गोंधळामुळे जि. प. कायद्यात दुरूस्ती! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पीएफचे पैसे आता एटीएम, यूपीआयद्वारे काढता येणार!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पीएफ खातेधारकांना दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. प्रॉविडंट फंडमधील रक्कम काढण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी सरकार नवी सुविधा आणणार आहे. पीएफ खात्यातील रक्कम एटीएम आणि यूपीआयद्वारे काढण्याची सुविधा मार्च २०२६ पासून सुरू होऊ शकते. केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांच्या मते पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्यातून ७५ टक्के रक्कम काढता येते. येत्या […] The post पीएफचे पैसे आता एटीएम, यूपीआयद्वारे काढता येणार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपच्या विरोधाला न जुमानता राष्ट्रवादीचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच मुंबईत विविध पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. या बैठकींमध्ये संभाव्य आघाड्या आणि उमेदवारांविषयी चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुती या दोन्ही आघाड्या मनपा निवडणुकीत एकसंध राहणार का? अशीही चर्चा आहे. दरम्यान, भाजपने नवाब मलिकांच्या नेतृत्वाला कडाडून विरोध केला. […] The post नवाब मलिकांकडेच नेतृत्व appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हार्म आणि हर्टनुसार कायद्यात बदल, झिरवळ यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी राज्यात गुटखा बंदी असतानाही शाळा परिसर, महाविद्यालय परिसरांसह अनेक ठिकाणी गुटखा आढळून येतो. त्यामुळे गुटखा बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी मकोका लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या मकोका लावण्यासाठीच्या प्रस्तावात आवश्यक त्या दुरुस्त्या कायद्यात करण्यात येणार आहेत. त्यानंतर येत्या नवीन वर्षांत गुटखा उत्पादकांवर […] The post गुटखा विकणा-यांवर आता मोक्का appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारत-द. आफ्रिकेचा चौथा सामना रद्द
लखनौ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना आज लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार होता. मात्र चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरत हा सामना अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाऊस किंवा वादळ नसतानाही सामना रद्द व्हावा, ही बाब सगळ््यांंनाच चकित करणारी ठरली. ]लखनौमध्ये संध्याकाळपासूनच मैदानात धुक्याची चादर होती. याच […] The post भारत-द. आफ्रिकेचाचौथा सामना रद्द appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात गुटखाबंदी असतानाही छुप्या मार्गाने सुरू असलेल्या गुटखा विक्रीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने आता अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. शाळा आणि महाविद्यालय परिसरात सर्रास मिळणाऱ्या गुटख्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याने, आता गुटखा उत्पादक आणि विक्रेत्यांवर थेट 'मकोका' अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या नवीन वर्षात या निर्णयाची कडक अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. गुटखा माफियांवर मकोका लावण्यासाठीचा प्रस्ताव यापूर्वीच विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, मकोका कायद्यातील तांत्रिक तरतुदींनुसार 'हार्म आणि हर्ट' या दोन्ही घटकांची पूर्तता होत नसल्याने मकोका लावण्यात अडचणी येत होत्या. ही त्रुटी दूर करण्यासाठी आता मूळ कायद्यातच आवश्यक त्या सुधारणा आणि दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. याबाबतची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपताच अन्न व औषध प्रशासन विभाग या कामाला लागला आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी गुटखाबंदी कायदा अधिक कठोर करण्यासाठी आणि मकोका लावण्यासाठी सुधारित प्रस्ताव तातडीने विधी व न्याय विभागाकडे पाठवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांच्या धाडीत कोट्यवधींचा गुटखा साठा सापडत आहे, मात्र जामिनावर सुटून आरोपी पुन्हा तोच धंदा करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता कायद्यातील पळवाटा बंद करून थेट मकोका लावल्यास गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गंभीर आरोप करत, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या, माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. देहू ते पंढरपूर या पवित्र मार्गाचे काम सध्या राष्ट्रीय महामार्ग 965 अंतर्गत सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून काही ठिकाणी ते निकृष्ट दर्जाचे झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांनी गडकरींकडे केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत: १. पालखी मार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत.२. आतापर्यंत झालेल्या निकृष्ट कामांची सखोल चौकशी करण्यात यावी.३. वारकऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि वृक्षारोपणाचे काम दर्जेदार असावे. हर्षवर्धन पाटील यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पालखी मार्गाच्या निकृष्ट कामांची चौकशी केली जाईल आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिले जातील, असे आश्वासन गडकरी यांनी या भेटीदरम्यान दिले. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा देहूपासून सुरू होऊन पंढरपूरपर्यंत जातो. लोणी काळभोर, यवत, इंदापूर, बारामती आणि अकलूज यांसारख्या महत्त्वाच्या गावांमधून जाणारा हा मार्ग आषाढी वारीसाठी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी जीवनवाहिनी आहे. वारकऱ्यांचा पायी प्रवास सुखकर व्हावा, यासाठी केंद्र सरकारने या मार्गाचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण हाती घेतले आहे. मात्र, कामाच्या दर्जाबाबत खुद्द स्थानिक नेत्यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने आता गडकरी काय ॲक्शन घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या २० परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी बुधवारी अमरावती जिल्हा परिषदेला भेट दिली. जिल्हा परिषदेचे कामकाज समजून घेण्यासाठी त्यांनी हा दौरा केला. 'यशदा'चे सत्र संचालक डॉ. आर. व्ही. पोले यांच्या नेतृत्वाखाली हे अधिकारी १९ डिसेंबरपर्यंत राज्यभर अभ्यास दौरा करत आहेत. या अभ्यास दौऱ्याचाच एक भाग म्हणून, बुधवारी सकाळी या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी पंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ बाळासाहेब बायस आणि सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकर्णी उपस्थित होते. या दोन्ही अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. सीईओ संजीता महापात्र यांनी मेळघाटमधील विकासात्मक उपक्रमांबद्दल माहिती दिली. त्यांनी भविष्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना लोकाभिमुख दृष्टिकोन, संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रशासनातील अनुभवातून मिळालेल्या महत्त्वपूर्ण टिप्सही त्यांनी दिल्या. या भेटीमुळे परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाची ओळख झाली आणि भविष्यातील जबाबदाऱ्यांची जाणीव झाली, असे त्यांनी नमूद केले. या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांमध्ये श्रद्धा उधवंत, सौरभ रंगटे, प्रणीता काळे, प्रतीभा काळे, अलम पंडू, परागीणी पाटील, अशोक बाराखोटे, सुनील धमाल, विठ्ठल पवार, सितारामजी रेवतकर, प्राजक्ता पाटील, आशिष खेनत, मच्छींद्र मिरकार, अनिकेत शकार्गे, राजू डोके, किरण काकडे, आशिष तालेवार, शुभम खोसे, नितीन मोरे, युवराज इकाद, महेश चोथे आणि स्नेहल माटे यांचा समावेश आहे. हे सर्व अधिकारी भविष्यात उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, गट विकास अधिकारी, सहायक विक्रीकर आयुक्त, सहायक परिवहन अधिकारी तसेच लेखा व कोषागार अधिकारी अशा विविध पदांवर कार्यरत होणार आहेत.
विदर्भातील प्रसिद्ध बहिरम यात्रेच्या पूर्वतयारीसाठी मंदिर कार्यालयात विशेष नियोजन आणि आढावा सभा घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांना महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले. यामध्ये वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, खाद्यपदार्थ आणि पाण्याची शुद्धता तसेच फिरत्या दवाखान्यांचा समावेश होता. या सभेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 'स्वच्छ बहिरम' अभियानांतर्गत कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र पथके नेमण्याच्या सूचना दिल्या. यात्रेच्या काळात कुठेही अस्वच्छता होणार नाही आणि प्लास्टिकचा वापर टाळला जाईल, याची काळजी घेण्याचे आदेश संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आले. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्वच्छता राखण्यावरही विशेष भर देण्यात आला. या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बाळासाहेब बायस, गटविकास अधिकारी डॉ. निलेश वानखडे, उपविभागीय महसूल अधिकारी बळवंत अरखराव, एबीडीओ गणेश घोगरकर, यात्रा व्यवस्थापक रामेश्वर रामागड, शिरजगाव कसबाचे ठाणेदार गवई यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, बांधकाम उपअभियंता, पाणीपुरवठा उपअभियंता, ग्रामपंचायत, मंदिर प्रशासन तसेच विद्युत विभाग आणि वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला यात्रेतील खानावळी आणि हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कडक भूमिका घेण्याचे निर्देश दिले. सर्व खानावळींची नियमित तपासणी करून स्वच्छतेचे नियम पाळले जात असल्याची खात्री करावी, असे त्यांनी सांगितले. वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेबाबत बोलताना, शनिवार आणि रविवारी यात्रेत मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी पोलीस विभागाला विशेष पार्किंग व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. यात्रेचे ठिकाण जंगल परिसराजवळ असल्याने माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले. तसेच, भाविकांच्या माहितीसाठी मंदिर प्रशासनाने परिसरात ठिकठिकाणी सूचनाफलक लावावेत, असेही निर्देश देण्यात आले.
राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. ७२ तासांत समेट न झाल्यास आगामी शुक्रवार, १९ डिसेंबरपासून अमरावतीसह राज्यभर ‘कामकाज बंद’ ठेवण्याचा निर्णय तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने घेतला आहे. पुण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच काम बंद आंदोलन सुरू केले आहे. संबंधित मंत्र्यांचा कारभार 'बेभान' आणि 'बेलगाम' असल्याचा आरोप महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यांच्या मते, मंत्री कोणतीही योग्य चौकशी न करता अधिकाऱ्यांवर एकतर्फी निलंबनाची कारवाई करत आहेत. या असंतोषामुळे कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय लोखंडे, कार्याध्यक्ष अक्षय मंडवे, उपाध्यक्ष अरविंद माळवे आणि सचिव अशोक काळीवकर यांच्या नेतृत्वात हे निवेदन अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी स्वीकारले. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनानुसार, महसूल मंत्री नैसर्गिक न्यायाची कोणतीही संधी न देता थेट विधीमंडळात निलंबनाची घोषणा करतात, हे योग्य नाही. अर्धन्यायिक कामकाजाच्या प्रकरणात तहसीलदारांनी दिलेले आदेश, तसेच महसूल हक्क नोंदीवरील आणि ज्या प्रकरणात अपीलाची तरतूद आहे, अशा प्रकरणात किंवा प्रशासकीय कामकाजात चूक झाल्यास विभागीय चौकशीच्या तरतुदी आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १५८ नुसार सदर कामकाजाबाबत दाव्यास प्रतिबंध करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना संरक्षणही देण्यात आले आहे. मात्र, त्याचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे अशा प्रशासकीय त्रुटींसाठी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येऊ नयेत, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मंत्री महोदयांद्वारे केल्या जाणाऱ्या सततच्या निलंबनांमुळे अधिकारी व कर्मचारी प्रचंड तणावात असून ते दहशतीखाली काम करत आहेत. त्यामुळे आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी आता केवळ मुख्यमंत्र्यांवरच विश्वास असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना, विदर्भ पटवारी संघटना, विदर्भ मंडळ अधिकारी संघटना तसेच विदर्भ कर्मचारी संघटना व म.रा. महसूल कर्मचारी संघटना यांनी स्थापन केलेल्या म.रा. महसूल कर्मचारी व अधिकारी समन्वय महासंघानेही यात सहभाग घेतला आहे. निवेदन देतेवेळी उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, शिवाजी शिंदे, निनाद लांडे, तहसीलदार पूजा माटोडे, महसूल कर्मचारी संघटनेचे ब्रिजेश वस्तानी, ज्ञानेश गुर्जर, सौरभ वानखडे, कमल गाठे आदी उपस्थित होते.
मेळघाटातील निवडक आदिवासी बांधवांनी नुकतीच दिल्लीतील संसद भवनाला भेट दिली. अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंतराव वानखडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला. या भेटीदरम्यान, आदिवासी बांधवांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी आणि संघटन सचिव के.सी. वेणुगोपाल यांच्याशी संवाद साधला. ज्यांनी आयुष्यात जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे कार्यालयही पाहिले नव्हते, अशा अनेक आदिवासी बांधवांना थेट दिल्लीत संसद भवन पाहण्याची संधी मिळाली. या अनुभवामुळे ते भारावून गेले असून, अनेकांनी 'जीवनात पहिल्यांदाच राजधानी दिल्ली अनुभवली' अशी भावना व्यक्त केली. संसद भेटीसाठी मेळघाटातील प्रत्येक गावातून आदिवासी बांधवांची निवड करण्यात आली होती. खासदार बळवंतराव वानखडे आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अभिनव संकल्पनेतून त्यांना दिल्लीपर्यंतचा प्रवास आणि 'संसद दर्शन' घडले. या दौऱ्यादरम्यान, आदिवासी बांधवांनी प्रियंका गांधी आणि के.सी. वेणुगोपाल यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली. चर्चेदरम्यान, आदिवासी बांधवांनी आपले गाऱ्हाणे आणि भावना नेत्यांसमोर मांडल्या. यावेळी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मेळघाटला दिलेल्या भेटीच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला. खासदार बळवंतराव वानखडे यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मेळघाट हा निसर्गरम्य असला तरी अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. येथील अनेक नागरिक आजही बाहेरील जगापासून अलिप्त आहेत. अशा बांधवांना देशाच्या लोकशाहीचे मंदिर पाहता यावे आणि जगाशी त्यांचा संपर्क वाढावा, ही खासदाराची जबाबदारी समजून मी हा पुढाकार घेतला. वानखडे पुढे म्हणाले की, हा उपक्रम केवळ एक सहल नसून, दुर्गम भागातील जनतेला देशाच्या सर्वोच्च सभागृहाची ओळख करून देणारा 'सामाजिक उत्तरदायित्व' ठरला आहे. या दौऱ्यात जि.प. चे माजी सभापती दयाराम काळे, चिखलदरा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सहदेव बेलकर, युवक काँग्रेसचे पुढारी राहुल येवले, धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल येवले, चिखलदरा तालुका अनुसूचित जाती काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मेहपतसिंग उईके, संजय बेलकर, राजेश सेमलकर, मेळघाट विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पियुष मालवीय, नानकराम ठाकरे, तोताराम कास्देकर, सोनाजी कास्देकर, शिकारी बेठेकर, तसेच चिखलदरा काँग्रेस कमिटीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा:सदनिका गैरव्यवहार प्रकरण भोवले, अटकेची टांगती तलवार कायम
राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर हा महत्त्वपूर्ण टप्पा समोर आला असून आता माणिकराव कोकाटे यांनी क्रीडामंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी आम्ही अपडेट करत आहोत
रोबोटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत दिया, इशिका ठरल्या विजेत्या
अहिल्यानगर : प्रतिनिधी उत्तर युरोपातील एस्टोनिया देशात आयोजित जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत अहिल्यानगरच्या दिया प्रीतम छाजेड व इशिका अभिजित अडसूळ या दोन भारतीय विद्यार्थिनींनी ऐतिहासिक यश संपादन करत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. जगभरातील ७० देशांतील २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मागे टाकत दोघींनी प्रथम क्रमांक पटकावून जागतिक विजेतेपद मिळवले. मूळची अहिल्यानगरची असलेली दिया सध्या बारामती […] The post रोबोटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत दिया, इशिका ठरल्या विजेत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारतीय अर्थव्यवस्था ‘गोल्डीलॉक्स’ स्थितीत!
नवी दिल्ली : प्रतिनिधी भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड वेगाने सुरू असून, आगामी काळात देशातील व्याजदर दीर्घकाळ खालच्या पातळीवर राहतील, असे स्पष्ट संकेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले आहेत. म्हणजे भविष्यात गृहकर्जाचा हप्ता वाढण्याची चिंता मिटणार आहे. रेपो रेटचा भविष्यातील कल : चालू महिन्याच्या सुरुवातीलाच मौद्रिक धोरण समितीने रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची […] The post भारतीय अर्थव्यवस्था ‘गोल्डीलॉक्स’ स्थितीत! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उच्च शिक्षणाबाबत एकच नियामक मंडळ स्थापणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील उच्चशिक्षण विषयक एकच नियामक मंडळ स्थापन करण्यासंदर्भातील ‘विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक’ १३ जणांच्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या संदर्भातील प्रस्ताव लोकसभेत मांडला. त्याला आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली. ही समिती या संदर्भातील आपला अहवाल पुढील वर्षी अर्थसंकल्पाच्या पहिल्या सत्राच्या अखेरच्या दिवशी सरकारला सादर […] The post उच्च शिक्षणाबाबत एकच नियामक मंडळ स्थापणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दिल्लीत ५०% कर्मचा-यांना आजपासून वर्क फ्रॉम होम! बांधकाम मजुरांना मिळणार १० हजार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजधानी दिल्लीत वाढत्या प्रदूषणाचे भीषण संकट लक्षात घेता राज्य सरकारने मोठी पाऊले उचलली आहेत. दिल्लीत यापुढे बीएस-६ पेक्षा कमी स्टँडर्डच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्याशिवाय कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयात ५० टक्क्यांपर्यंत कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होम बंधनकारक करण्यात […] The post दिल्लीत ५०% कर्मचा-यांना आजपासून वर्क फ्रॉम होम! बांधकाम मजुरांना मिळणार १० हजार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मोकाट कुत्र्यांसाठी ‘एआय’; प्रकल्पात १० हजार श्वान
मुंबई : प्रतिनिधी शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून एक प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीद्वारे भटक्या कुत्र्यांची तपशीलवार नोंद, त्यांची ठिकाणे, निर्बिजीकरण तसेच आरोग्यविषयक माहिती आणि व्यवस्थापनासाठी आवश्यक संसाधने एकत्र केली जाणार असून, आश्रयस्थाने, स्वयंसेवी संस्था, पशु काळजीवाहक व पशुवैद्यकीय विभागांना याचा लाभ होणार आहे. ११ […] The post मोकाट कुत्र्यांसाठी ‘एआय’; प्रकल्पात १० हजार श्वान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आठवड्यात ६ तर, वर्षभरात ५४ वाघांचा मध्यप्रदेशात बळी
भोपाळ : वृत्तसंस्था ‘टायगर स्टेट’ म्हणून ओळखल्या जाणा-या मध्य प्रदेशमध्ये वाघांच्या मृत्यूंचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत (१३ डिसेंबरपर्यंत) तब्बल ५४ बाघांचा मृत्यू झाला असून, १९७३ मध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाल्यानंतर एका वर्षातील हा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या एका आठवड्यातच राज्यात ६ वाघांचे मृत्यू झाल्याने वन्यजीव संरक्षणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. […] The post आठवड्यात ६ तर, वर्षभरात ५४ वाघांचा मध्यप्रदेशात बळी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नाशिकचे आमदार माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाल्याने त्यांची आमदारकी धोक्यात आली असतानाच, आता भंडाऱ्याचे आमदार राजू कारेमोरे यांनाही न्यायालयाने दोषी ठरवले आहे. मात्र, लोकप्रतिनिधी म्हणून चांगली वागणूक असल्याने न्यायालयाने त्यांना दोन वर्षे शिस्तीत राहण्याच्या अटीवर सोडून दिल्याने कारेमोरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भंडाऱ्याच्या तुमसर-मोहाडी विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे यांना पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. द्वितीय श्रेणी तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश भारती काळे यांनी हा निकाल दिला. न्यायालयाने कारेमोरे यांना कलम 143, 294 आणि 504 अन्वये दोषी धरले, तर कलम 353 मधून त्यांची निर्दोष मुक्तता केली. तथापि, आमदार कारेमोरे आणि त्यांचे चार सहकारी हे लोकप्रतिनिधी असून त्यांची समाजात चांगली वागणूक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे त्यांना थेट शिक्षा न सुनावता, पुढील दोन वर्षे कुणाशीही वाद न घालता लोकप्रतिनिधीला साजेसे वर्तन ठेवावे, अशी तंबी देत न्यायालयाने त्यांची 'बंद पत्रावर' सुटका केली. काय आहे प्रकरण? हे प्रकरण 31 डिसेंबर 2021 रोजीचे आहे. आमदार कारेमोरे यांचे मित्र यासीन छवारे आणि अन्य सहकारी वरठी येथून तुमसरकडे जात होते. त्यावेळी मोहाडी-तुमसर मार्गावर नगरपंचायत निवडणुकीच्या स्ट्रॉंग रूमबाहेर काही पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी पोलिसांनी 50 लाख रुपये लुटल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप कारेमोरे यांनी केला होता. या घटनेनंतर संतापलेल्या राजू कारेमोरे यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली होती. याप्रकरणी 3 जानेवारी 2022 रोजी त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. याच खटल्याचा निकाल आज लागला. कोकाटेंवर टांगती तलवार एकीकडे कारेमोरे यांना दिलासा मिळाला असला तरी, दुसरीकडे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी कायम आहेत. एका जुन्या प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. नियमानुसार दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधींचे पद रद्द होऊ शकते. त्यामुळे कोकाटेंच्या आमदारकीवर टांगती तलवार असतानाच, आता दुसऱ्या आमदारालाही न्यायालयाने दोषी ठरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ना वाल्मीक कराडला जामीन मिळणार, ना धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार, अशी टीका सोनवणे यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, धनंजय मुंडे मंत्रिमंडळात येणार नाहीत. मी ठामपणे सांगतो, मंत्रिमंडळात त्यांना घेणार नाहीत. त्यांना कोणीही घेणार नाही. वाल्मीक कराडला जामीन मिळणार नाही आणि धनंजय मुंडे यांना कोणीही मंत्रिमंडळात घेणार नाही, असा टोला सोनवणे यांनी लगावला आहे. धनंजय मुंडे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली, यावर बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, ते त्यांच्या पक्षाला अंधारात ठेऊन, मुंबईला चाललो म्हणून दिल्लीला आले आहेत. ते त्यांच्याच पक्षातील नेत्यांना ते अंधारात ठेवतात. तसेच ते मंत्री होणारच नाहीत, त्यामुळे मी जर तर वर बोलणार नाही. मी जबाबदारीने सांगतोय. आता ते महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात पुन्हा दिसणार नाही. त्यांना मंत्री व्हायचे असेल तर अमेरिकेला जावे लागेल, असा खोचक टोला सोनवणे यांनी लगावला. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडे आणि अमित शहा यांच्या भेटीवर आक्षेप घेत ट्विट करत टीका केली आहे. त्या म्हणाल्या, अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटले की, ना खाउंगा ना खाने दुंगा म्हणणाऱ्या पक्षाचे अमित शहा, मला म्हणजे भ्रष्टाचारा विरोधात लढणाऱ्या व्यक्तिला वेळ देत नाहीत, पण अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि आता धनंजय मुंडे यांना भेटण्याची वेळ देतात. यात काय ते समजून जा, असे दमानिया यांनी म्हटले आहे. तसेच भाजपला काय बोलू, शब्दच उरले नाहीत, अशी टीका दमानिया यांनी केली आहे. ... तर फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही पुढे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या आरोपांची थेट यादीच केली आहे. त्या म्हणाल्या, ज्या धनंजय मुंडेंवर 1) बीड बँक घोटाळ्याचे आरोप आहेत, 2) बंदूक राज आणल्याचे आरोप आहेत, 3) महाजेनको मधून राख चोरल्याचे आरोप आहेत, 4) आवादा कंपनीकडून खंडणी मागीतल्याचे आरोप आहेत, 5) कृषी घोटाळ्याचे आरोप आहेत, 6) दहशत, बंदूकराज, गुंडाराज केल्याचे आरोप आहेत आणि सगळ्यात किळसवाणे म्हणजे ज्या क्रूर पद्धतीने स्व. संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी करवून घेतली त्या विकृत वाल्मीक कराडची उणीव भासते, असे म्हणणारे धनंजय मुंडे जर परत मंत्री म्हणून परत आले, तर या भाजपचा बहिष्कार लोकांनी केला पाहिजे, असे दमानिया म्हणाल्या. तसेच जर फडणवीसांनी हे होऊ दिले, तर मी या जन्मी त्यांना माफ करणार नाही, असे अंजली दमानिया यांनी स्पष्ट म्हटले आहे.
राज्यात महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचे विनाचौकशी होणाऱ्या निलंबनाच्या विरोधात तसेच प्रलंबित प्रश्ना संदर्भात राज्यात समन्वय महासंघाने आंदोलनाचे हत्यार उपसले असून शुक्रवारपासून ता. १९ बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात सुमारे ४० हजारापेक्षा अधिक कर्मचारी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या संदर्भात महासूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. यामध्ये राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधीमंडळात काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली. मात्र त्यांची कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही. विना चौकशी निलंबन करणे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक आहे. या प्रकारामुळे अधिकारी व कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करीत असल्याचे नमुद करण्यात आले आहे. या शिवाय महसूल अधिकाऱ्यांना गौण खनीज अवैध उत्खननामध्ये केवळ दंड आकारण्याचे अधिकार आहेत. मात्र गौण खनीज वाहूतक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग करून त्यांना पकडणे, जमावाला तोंड देण्याचे काम अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. वास्तविक हे काम पोलिस व उपप्रादेशीक परिवहन विभागाचे आहे. मात्र त्यांच्याकडे याबाबत विचारणाही न करता केवळ महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून कारवाई केली जात असून सदर प्रकार अन्यायकारक आहे. दरम्यान, राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करणे, अपीलीय प्रकरणात संरक्षण देणे, पोलिस विभागाच्या धर्तीवर नायब तहसीलदार पदासाठी महसूल खात्यांतर्गत परिक्षा घेण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारपासून ता. १९ कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात ४० हजार अधिकारी व कर्मचारी सहभागी होतील अशी माहिती राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जीवन आहेर यांनी दिली आहे. शासनाकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न या प्रकरणात आता शासनाकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. त्यासाठी समन्वय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात गुरुवारी ता. १८ दुपारी एक वाजता चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. या चर्चेतून काय तोडगा निघणार याकडे महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या तोंडावर महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे निवडणुकांची तयारी, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. इतकेच नव्हे, तर यात भर म्हणून आता अजित पवारांच्याच पक्षातील माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची शक्यता असतानाच धनंजय मुंडे यांनी अमित शहा यांची भेट घेणे हा योगायोग नसून मंत्रिपदासाठी सुरू असलेली सेटिंग आहे की काय? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत जोरदार टीका केली आहे. तसेच धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या जन्मी माफ करणार नसल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटले की, ना खाउंगा ना खाने दुंगा म्हणणाऱ्या पक्षाचे अमित शहा, मला म्हणजे भ्रष्टाचारा विरोधात लढणाऱ्या व्यक्तिला वेळ देत नाहीत, पण अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि आता धनंजय मुंडे यांना भेटण्याची वेळ देतात. यात काय ते समजून जा, असे दमानिया यांनी म्हटले आहे. तसेच भाजपला काय बोलू, शब्दच उरले नाहीत, अशी टीका दमानिया यांनी केली आहे. ... तर फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही पुढे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या आरोपांची थेट यादीच केली आहे. त्या म्हणाल्या, ज्या धनंजय मुंडेंवर 1) बीड बँक घोटाळ्याचे आरोप आहेत, 2) बंदूक राज आणल्याचे आरोप आहेत, 3) महाजेनको मधून राख चोरल्याचे आरोप आहेत, 4) आवादा कंपनीकडून खंडणी मागीतल्याचे आरोप आहेत, 5) कृषी घोटाळ्याचे आरोप आहेत, 6) दहशत, बंदूकराज, गुंडाराज केल्याचे आरोप आहेत आणि सगळ्यात किळसवाणे म्हणजे ज्या क्रूर पद्धतीने स्व. संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी करवून घेतली त्या विकृत वाल्मीक कराडची उणीव भासते, असे म्हणणारे धनंजय मुंडे जर परत मंत्री म्हणून परत आले, तर या भाजपचा बहिष्कार लोकांनी केला पाहिजे, असे दमानिया म्हणाल्या. तसेच जर फडणवीसांनी हे होऊ दिले, तर मी या जन्मी त्यांना माफ करणार नाही, असे अंजली दमानिया यांनी स्पष्ट म्हटले आहे.
सातारा जिल्ह्यात सावरी गावात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टजवळ असलेल्या एका शेडमधून मुंबई गुन्हे शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईतून जवळपास 45 किलो ड्रग्स जप्त केले असून याची बाजारपेठेतील किंमत 145 कोटी इतकी आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील निशाणा साधला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबई येथील टिळक भवन येथे पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, सावरी गावात एवढा मोठा ड्रग्सचा कारखाना सुरू होता याची कल्पना सातारा पोलिसांना होती पण त्यांनी कारवाई केली नाही. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली. साताऱ्याचे पोलिस अधीक्षक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. हे तेच पोलिस अधीक्षक आहेत ज्यांनी आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना मराठा समाजाच्या माता भगिनींवर अमानुष लाठी हल्ला केला होता. साताऱ्यातील ड्रग्स प्रकरणी शिंदे व फडणवीस यांची मिलीभगत आहे का? या प्रश्नाचे उत्तर फडणवीस आणि शिंदे यांनी दिले पाहिजे. एवढा मोठा ड्रग्सचा कारखाना असल्याचे उघड झाले असताना अद्याप यामागील खऱ्या सूत्रधारावर कारवाई केलेली नाही. या सावरी गावाजवळच एकनाथ शिंदे यांचे दरे हे गाव असून त्यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांचा हा काळा धंदा सुरू होता. सावरी गावातील ड्रग्सचा कारखाना व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लागेबांधे असल्यानेच सरकार ठोस कारवाई करत नाही, असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, सातारा ड्रग्स प्रकरणावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी निवडणुक आयोगाची मदत घेण्यात आली व महानगरपालिका निवडणुकांची घाईघाईने घोषणा करण्यात आली. मतदार याद्या अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. 15 तारखेला मतदार याद्या जाहीर करणार होते पण आता बुथनिहाय 27 तारखेला या मतदार याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास 23 तारखेपासून सुरुवात होत आहे आणि उमेदवारी अर्जावर उमेदवाराला तसेच सुचक, व अनुमोदक यांना त्यांचे मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक लिहावा लागतो पण मतदार याद्याच नाहीत तर अर्ज कसे भरणार? असा सवालही सपकाळ यांनी उपस्थित केला. राज्यातील पाब्लो शिंदेला अटक का नाही? महाराष्ट्रातील विशेषतः सातारा जिल्ह्यातील ड्रग्स प्रकरणी महाराष्ट्र कॉंग्रेसने ट्विट करत राज्यातील पाब्लो शिंदेला अटक का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच गृहमंत्र्यांना उद्देशून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र कॉंग्रेसने उपस्थित केले प्रश्न खालीलप्रमाणे आहेत: 1. विशाल मोरे आणि त्याचे तीन सहकारी सावरी गावात ड्रग्स बनवतात असे पोलिसांना सांगितल्यावर छापा टाकून पोलिसांनी एकूण चार आरोपींना अटक केली आहे. परंतु विशाल मोरे हा पुण्यातील अजित दादा गटाचा विद्यार्थी अध्यक्ष आहे, मग त्याला सातारा जिल्ह्यातील सावरी या दुर्गम भागातील शेड ड्रग्स बनवण्याकरिता कशी उपलब्ध झाली? तो जळका वाडा विशाल मोरे ने ड्रग्स बनवण्यासाठी का निवडला? त्या ठिकाणी साहित्य त्याने कोणाच्या मदतीने नेले? पश्चिम बंगालमधील कामगार त्याने इतक्या दुर्गम स्थळी नेऊन ठेवले या सर्वांना कोणाचे अभय होते? 2. ओंकार दिघे हा व्यक्ती सुद्धा पोलिसांना सदर ठिकाणी आढळून आला, तसेच घटनास्थळावर केलेल्या तपासातून या सर्व ड्रग्स फॅक्टरी ची सूत्रे प्रकाश शिंदे त्याच्या तेजस हॉटेलमधून चालवत असल्याचे पोलिसांना त्याच क्षणी तपासात निष्पन्न झाले. परंतु उपमुख्यमंत्री यांचा एक सचिव व श्रीकांत शिंदे यांचा पीए यांनी कारवाई करता गेलेले सीनियर पी आय आत्माजी सावंत यांच्यावर प्रचंड दबाव आणला. उपमुख्यमंत्री यांनी आयुक्त क्राईम ब्रांच यांच्यावर दबाव आणत सिनियर पीआय यांनी वरिष्ठांचा आदेश मानत ओंकार दिघे याला ताब्यात घेतलेले असताना परत स्थानिक नेत्यांकडे पाठविले. 3. सदर ड्रग्स ची Quantity पाहता हे फक्त तीन माणसांनी तयार केलेले नाही. त्यासाठी खूप मोठी यंत्रणा राबली आहे. या सर्व रॅकेटचा सूत्रधार प्रकाश शिंदे आहे. या प्रकाश शिंदे हा एकनाथ शिंदे यांचा भाऊ असून त्यांना एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांचे पाठबळ आहे. प्रकाश शिंदे यांच्या वतीने ओंकार दिघे याने तेजस हॉटेल येथे परप्रांतीय कामगारांची व्यवस्था लावली व तेथे प्रकाश शिंदे हाच ड्रग निर्मिती करून घेत होता. ज्या दिवशी विशाल मोरे वर कारवाई झाली त्या क्षणी प्रकाश शिंदे तेजस हॉटेल वरून निघून गेला. परंतु ओंकार दिघे हा पोलिसांना सापडला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते चौकशी चालू होती त्यावेळी उपमुख्यमंत्री यांचे एक सचिव यांनी आयुक्त यांना फोन करून दबाव टाकला व श्रीकांत शिंदे यांचे खाजगी सचिव यांनी फोनवरून कारवाई करता गेलेल्या सीनियर पी आय ला स्वतः श्रीकांत शिंदे यांनी कारवाई करू नका यासाठी दबाव टाकला. 4. पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती ही खोटी व दबावापोटी दिलेली आहे. एकटा विशाल मोरे इतक्या दुर्गम ठिकाणी ड्रग्स रॅकेट चालवू शकत नाही. तर ड्रग्स निर्माता हा स्वतः प्रकाश शिंदे आहे जो हॉटेलवरून अगोदरच निघून गेला. 5. ज्या ओंकार दिघे याला पोलिसांनी घटनास्थळावर ताब्यात घेतले होते त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री व श्रीकांत शिंदे यांच्या दबावामुळे सोडण्यात आले. त्याच्यावर यापूर्वीही बलात्कारासारख्या गंभीर तक्रारी झाल्या होत्या त्यावेळी देखील प्रकाश शिंदे यांनी मध्यस्थी करून ओंकार दिघेला अभय दिले आहे. 6. प्रकाश शिंदे, विशाल मोरे, ओंकार दिघे, सदर कारवाईसाठी हजर असलेले सिनियर पीआय यांचे सीडीआर पोलिसांनी उघड करावेत. त्यातून लगेचच सर्वांचे संबंध निष्पन्न होईल. तसेच सीनियर पीआय वर कोणी दबाव आणला हे ही स्पष्ट होईल. 7. विशाल मोरे ला ताब्यात घेतले तेव्हा त्याने वापरलेली उबेर रिक्षाच्या ड्रायव्हरचे स्टेटमेंट सुद्धा पोलिसांनी घेतले आहे. परंतु ड्रग्स बनवणाऱ्या कामगारांचे नियोजन बघणारा ओंकार दिघे याला कारवाई दिवशी ११ वाजता गावच्या सरपंचाच्या ताब्यात दिले व त्यांचा कोणताही संबंध पोलिसांनी दाखवला नाही. 8. मुंबई पोलीस प्रामाणिकपणे काम करत होते, ते दबावाला बळी पडत नव्हते त्यावेळी जाणून बुजून सातारा एस पी यांना सदर ठिकाणी पाठविण्यात आले व तपासात ढवळाढवळ करण्यात आली. 9. याप्रकरणी सातारा एसपींची बदली झाली पाहिजे. या तुषार दोषी यांनी जालना एसपी असताना अंतरवली येथे सामान्य मराठा आंदोलकांवर लाठी चार्ज केला होता, याचे बक्षीस म्हणून सातारा जिल्ह्याचा पदभार त्यांना देण्यात आला. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सातारा एसपींनी सरकारच्या बाजूने भूमिका घेतली. यावेळी देखील ते सरकार मधील बगलबच्च्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण असो, ज्या उपमुख्यमंत्र्यांच्या गावात शेकडो वेळा सातारा पोलिसांचा ताफा गेला आहे तिथे ड्रगचे मोठे घबाड सापडणे इतक्या गंभीर घटना असूनही केवळ एस पी हे गृहमंत्र्यांचे लाडके असल्यामुळेच त्यांची बदली होत नाही.
उमेदवारी अर्जावर निवडणूक निर्णय अधिका-यांचा निर्णय अंतिम राहणार
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम १४ (२) मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि […] The post उमेदवारी अर्जावर निवडणूक निर्णय अधिका-यांचा निर्णय अंतिम राहणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
साता-यातील ड्रग्ज प्रकरणात एकनाथ शिंदेंचे लागेबांधे
मुंबई : सातारा जिल्ह्यातील सावळी गावात एमडी ड्रग्जचा मोठा कारखाना मुंबई क्राईम ब्रँचने उघड केला पण फडणवीस सरकार हे प्रकरण गांभिर्याने घेत नाही. एवढा मोठा ड्रग्जचा कारखाना असल्याचे उघड झाले असताना अद्याप यामागील ख-या सुत्रधारावर कारवाई केलेली नाही. या सावळी गावाजवळच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे हे गाव असून त्यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांचा हा […] The post साता-यातील ड्रग्ज प्रकरणात एकनाथ शिंदेंचे लागेबांधे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धनंजय मुंडेंनी घेतली अमित शहांची भेट
नवी दिल्ली : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची २ वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानंतर आज त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाला आहे. मात्र अद्यापही कोकाटें अटक करण्यात आली नाही. अटक झाल्यास मंत्रिपद जाईल. त्यामुळे त्यांचे पद कुणाकडे द्यायचे? या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व सरकारमध्ये धीरगंभीर चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय […] The post धनंजय मुंडेंनी घेतली अमित शहांची भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सातारा जिल्हा बनतोय ड्रग्सचा अड्डा!:सावरीनंतर आता पाचगणीतून 5 लाखांचे कोकेन जप्त, 10 जणांना अटक
महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी ड्रग्सचे साठे आढळून येत आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणीमध्ये देखील अशीच घटना उघडकीस आली आहे. पाचगणी पोलिसांनी वाहन तपासणीवेळी एका गाडीतून तब्बल 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाचगणीत अमली पदार्थांचा वापर केला जात असल्याची गोपनीय मानीती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणी दरम्यान एका गाडीतून कॅप्सुलसह 13 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जवळपास 5 लाख रुपये किंमत आहे. तसेच या गाडीतून ताब्यात घेण्यात आलेल्या इतर सामग्री मिळून एकूण 42 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी 10 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी हे पर्यटनाच्या बहाण्याने पाचगणीत आले होते. तसेच आता पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे अमली पदार्थ कुठून आणले गेले आणि यात आणखी कोणाचे मोठे रॅकेट सक्रिय आहे का? या दिशेने सातारा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सातारा जिल्ह्यातील सावरी गावात 45 किलो ड्रग्स जप्त सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील असणाऱ्या शेडवर मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्सचा साठा सापडला होता. या ड्रग्सची बाजारपेठेतील किंमत 145 कोटी रुपये इतकी आहे, त्या ठिकाणी काम करत असलेल्या तिघांना एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांच्या जावळी तालुक्यातील हॉटेल तेजयशमधून जेवण जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. वाचा सविस्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, 1961 च्या कलम 14 (2) मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे जिल्हा परिषद, पंचायती समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जाशी संबंधित मुद्यांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. त्याचा मोठा लाभ सत्ताधाऱ्यांना मिळण्याचा दावा केला जात आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, 1961 च्या कलम 14 (2) मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका वेळेत आणि कालबध्द रितीने व्हाव्यात या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियमातील कलम 14 मध्ये, पोट-कलम (2) अंतर्गत उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्रे) स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयासमोर अपील दाखल करता येत होते. निवडणुका कालबद्धरित्या घेणे होणार शक्य मात्र विविध जिल्हा न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी अशी अनेक अपीले प्रलंबित राहत असल्याने निवडणुका कालबद्धरित्या घेणे शक्य होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने शासनास या तरतुदी वगळण्याबाबतचा प्रस्ताव शासनास पाठविला आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनास अशा निवडणुकांबाबत नियम करता येतील, तसेच उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्रे) स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असेल, अशी कलमे यात समाविष्ट करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, 2025 काढण्यास बैठकीत मंजूरी देण्यात आली. राज्य संरक्षित परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी समिती याच बैठकीत गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्याचाही निर्णय हातावेगळा करण्यात आला. या निर्णयानुसार सांस्कृतिक कार्य विभागाच्या यापूर्वीच्या (दि. 20 जानेवारी 2025) शासन निर्णयातील गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्याबाबतच्या तरतूदींची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. यामध्ये आता राज्य संरक्षित स्मारकांचाही समावेश करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या नेतृत्वातील समितीत महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री, पर्यटन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, वन मंत्री, बंदरे व विकास मंत्री तसेच संबंधित विभागांचे सचिव, प्रधान सचिव किंवा अपर मुख्य सचिव यांचा समावेश असणार आहे. जिल्हास्तरीय समितीत 4 अशासकीय सदस्य राज्यस्तरीय समितीमध्ये 4 निमंत्रित सदस्यांचा समावेश करण्यास तसेच प्रत्येक जिल्ह्यात गठीत करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय समितीमध्ये 4 अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हे अशासकीय सदस्य गड-किल्ले व राज्य संरक्षित स्मारकांचे अभ्यासक असावेत किंवा संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेली व्यक्ती अथवा स्वयंसेवी संस्था असावी, अशी अट ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील गड-किल्ले व राज्य संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमणे रोखणे व ती काढून टाकण्याची कारवाई संबंधित जिल्हाधिकारी यांना त्या-त्या जमिनीच्या मालकीच्या विभागाच्या समन्वयाने करावी लागणार आहे. तसेच यासाठीचा खर्च जिल्हा नियोजन व विकास निधीमधून करता येणार आहे.
वाल्मिक कराडचा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला
छत्रपती संभाजीनगर : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात कराडने दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. वाल्मिक कराडने औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर १२ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून सायंकाळी ६ […] The post वाल्मिक कराडचा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुरूड येथे शिंदे गटाची काँग्रेसची हातमिळवणी
रायगड : महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेंवर तिखट हल्ला चढवला आहे. शिवसेनेने काँग्रेसशी युती करून बाळासाहेबांचे विचार खुंटीऐवजी समुद्रात डुबवल्याचे म्हटले जात आहे. राज्यात महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणे अस्तित्वात येत आहेत. त्यात एकमेकांचे घोर विरोधकही एकत्र येण्याच्या […] The post मुरूड येथे शिंदे गटाची काँग्रेसची हातमिळवणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांच्या जावळी तालुक्यातील सावरी गावातील असणाऱ्या रिसॉर्टमध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्सचा साठा सापडला होता. या ड्रग्सची बाजारपेठेतील किंमत 145 कोटी रुपये इतकी आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. तसेच पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केली पण ड्रग्सशी संबंधित ज्या तीन लोकांची नावे एफआयआरमध्ये असायला पाहिजे होती, ती नसल्याचेही अंधारे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करताना सुषमा अंधारे म्हणाल्या, एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे याच्या जावळी तालुक्यातील सावरी गावातील असणाऱ्या रिसॉर्टमध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्जचा साठा सापडला होता. साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी या संदर्भातील माहिती लपवून ठेवली होती. तसेच आता एखाद्या प्रकरणात पोराचे नाव आले तर बापाचा राजीनामा मागितला जात असेल तर मग ड्रग्स प्रकरणात भावाचे नाव आल्यावर एकनाथ शिंदे यांचाही राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. तसेच यानंतर मला काहीही झाले तर आज ज्यांची नावे मी घेतली ते लोक जबाबदार असतील, असेही त्यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे यांनी केलेल्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, हे प्रकरण उघडकीस आणल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सुरक्षेची हमी द्यावी. या विषयावर सक्तीचे राजकारण बाजूला ठेऊन ते माझ्या पाठीशी उभे राहतील अशी मला आशा आहे. उके नावाच्या वकिलाने भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, नवाब मलिक यांनी देखील काही मुद्दे समोर आणले होते, त्यानंतर त्यांच्यासोबत काय झाले होते हे सर्वांना माहीत आहे. सुषमा अंधारे यांनी आरोप केलेले प्रकरण नेमके काय? सुषमा अंधारे यांनी सांगितले की, 13 डिसेंबर रोजी सावरी गावात कारवाई झाली. सुरवातीला मुकंद गावात कारवाई झाली होती. त्याचे धागेदोरे पुण्यात आले. यात विशाल मोरे याला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीतून सावरी गावाची माहिती मिळाली. या गावात पोलिसांचे पथक पोहोचले. मी स्वतः सावरी गावात जाऊन आले आणि मला काही धक्कादायक माहिती मिळाली. या ठिकाणी कोयनेचे बॅकवॉटर आहे. इथे स्विमिंग टँक तयार होत आहेत. रिसॉर्ट होत आहे. इथून जवळ असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये कारवाई करण्यात आली. इथे 75 लाख खर्च करून रस्ता तयार करण्यात आला आहे. इथे गाव नाही, माणूस नाही तरी इथे शेडला जोडणारा रस्ता का तयार करण्यात आला? इथल्या रिसॉर्टमध्ये सात ते आठ रूम बांधून तयार आहेत. या रिसॉर्टमध्ये अनेक सुविधा आहेत. याठिकाणी एक डस्टर गाडी आहे. पोलिसांनी या रिसॉर्टमध्ये केलेल्या कारवाईत 45 किलो ड्रग्स सापडले. याची किंमत 145 कोटी आहे. ही बातमी फार चर्चेत आली नाही. हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे आहे. या शेडचा मालक गोविंद सिंदकर आहे. याच्या शेडची चावी ओंकार दिघे याने घेतली अशी माहिती गोविंद याने दिली. ओंकार दिघे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सोडले. पोलिसांनी त्याला का सोडले हे अजून माहीत नाही. मुंबई पोलिस त्या ठिकाणी का गेले? असे सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले. एसपी तुषार दोशींनी माहिती लपवली पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, रणजीत शिंदे हा एकनाथ शिंदे गटाचा तालुका प्रमुख आहे. एकनाथ शिंदे ज्या गावाचे आहेत त्या गावचा हा सरपंच आहे. या सगळ्या संबंधाने काही गोष्टी समोर आल्या. रणजीत शिंदे कुठे आहे? त्याचे नेमके काय झाले? रणजीत शिंदे याने हे हॉटेल का चालवावे, त्याचा काय संबंध? प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत. ठाण्यातून 2017 आली त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती. पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेली गोष्ट अशी की, या ठिकाणी तीन जण राहत होते. आसाम राज्यातून त्यांना या ठिकाणी कुणी आणले असेल? यातले काही बांगलादेशी आहेत असेही म्हटले जाते? हे तीन रिसॉर्टमध्ये कसले काम करत होते? तसेच एसपी तुषार दोशी यांनी यासंदर्भातील माहिती लपवल्याचा आरोप अंधारे यांनी केला. तीन जणांची नावे पोलिसांच्या एफआयआरमध्ये का नाहीत? स्थानिक लोकांनी सांगितले की, ही लोक भारतीय नसावीत. त्यांच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी दिसत होती. या तीन लोकांना जेवण प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या हॉटेलमधून जात होते. या तीन कामगारांना या पंचतारांकित हॉटेलमधील जेवण कसे परवडत होते? अर्थात ही माहिती पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. या तीन जणांची नावे पोलिसांच्या एफआयआरमध्ये का नाहीत? एफआयआर ऑनलाइन का दिसत नाही, एफआयआर अशी लपवता येत नाही. सरकारशी संबंधित जेव्हा एफआयआर असतात तेव्हा त्या लपवल्या जातात. जे हॉटेल आहे की रिसॉर्ट? याचे नाव हॉटेल तेजयश आहे. हे तेज आणि यश प्रकाश शिंदे यांची मुले आहेत, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. हे विरोधकांचे षड्यंत्र - प्रकाश शिंदे सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांनी फेटाळून लावले आहेत. एका वृत्तवाहिनीला बोलताना ते म्हणाले, सुषमा अंधारे यांचे आरोप साफ खोटे आहेत, हे विरोधकांचे षड्यंत्र आहे. ज्या स्पॉटवर हे ड्रग्स सापडले आहेत, तिथून तीन ते साडे तीन किमी लांब ती जागा आहे. पोलिसांच्या अहवालानुसार सर्वांनी माहिती घ्यावी. माझ्या जागेशी त्या घटनेचा काहीही संबंध नाही. तो माझा रिसॉर्ट नसून गेल्या 6 महिन्यांपूर्वी रणजीत शिंदे यांना ती जागा दिलेली आहे. तसेच, तिथे रिसॉर्ट नसून ती केवळ जागा आहे. साताऱ्याच्या एसपींना मी कधी बघितले नाही, किंवा त्या एसपींनी देखील मला कधी बघितलेले नाही, असेही शिंदेंनी स्पष्ट केले. पुढे बोलताना प्रकाश शिंदे म्हणाले, मी नगरसेवक म्हणून एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देत राहतो. पोलिसांनी धाड मारली हे चांगले आहे. पोलिस तपासात सगळे समोर आले, जे ड्रग्ज सापडले त्यानुसार कारवाई केली पाहिजे. मात्र, माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे आणि राजकीय षडयंत्र असल्याचे प्रकाश शिंदे यांनी म्हटले आहे.

29 C