SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

29    C
... ...View News by News Source

एका गटाचे 22 आमदार दुसरीकडे जाणार:आदित्य ठाकरे यांचे शिंदे गटाकडे बोट; नको त्या विषयात हात घालू नका, नीलेश राणेंचा पलटवार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील 22 आमदार दुसरीकडे जाणार असल्याच्या चर्चेचे पेव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात फुटले आहे. आदित्य ठाकरे यांनी सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्याला हवा देत शिंदे गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण शिंदे गटाने त्यांना त्यांच्याकडे केवळ 20 आमदार राहिल्याची आठवण करून देत त्यांचा हल्ला परतावून लावला. आदित्य ठाकरे यांनी नको त्या विषयाला हात घालू नये. आपली ताकद नाही त्या विषयात बोलू नये, असे शिंदे गटाने म्हटले आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही चर्चा आतापर्यंत अनेकदा फेटाळली आहे. पण या चर्चेला अद्याप पूर्णविराम मिळाला नाही. त्यातच आता शिंदे गटाचे 20 हून अधिक आमदार लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचाही दावा विरोधकांकडून केला जात आहे. यामुळे शिंदे गटात खळबळ माजली असताना आता आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा या विषयाला हात घातला आहे. एका गटाचे 20 आमदार दुसरीकडे जाणार आहेत - आदित्य ठाकरे पत्रकारांनी आज आदित्य ठाकरे यांना त्यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवण्याची चर्चा सुरू असल्याच्या मुद्यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर आदित्य यांनी ही पेरलेली बातमी असून, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्ट केले. तसेच कोणत्या तरी गटाचे 22 आमदार दुसरीकडे जाणार असल्याची चर्चा आपल्या कानावर असल्याचेही ते यावेळी म्हणाले. माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवण्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. ही पेरलेली बातमी आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. पण मीच 22 आमदार कोणत्या तरी गटातून दुसरीकडे जात आहेत हे ऐकले आहे, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे ज्योतिषी आहेत का? - आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या या दाव्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांचा एक गट कथितपणे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेचे पेव फुटले आहे. पण शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी जोरकसपणे त्यांचा हा दावा फेटाळला आहे. ते म्हणाले, आदित्य ठाकरे ज्योतिषी आहेत का ते? त्यांचे आमदार किती राहिलेत? त्यांचे वीसच राहिलेत ना. त्यामुळे त्यांनी नको त्या विषयात हात घालू नये. त्यापेक्षा त्यांनी एखाद्या विधायक सामाजिक मुद्यावर चर्चा करावी. नको त्या विषयात म्हणजे जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये, असे नीलेश राणे यांनी म्हटले आहे. चंद्रकांत खैरे यांनी केला होता दावा उल्लेखनीय बाब म्हणजे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दाखला देत शिंदेंचे 20 आमदार भाजपत जाणार असल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते, शिंदे गटाचे आमदार भाजपत जाणार असल्याच्या बातम्यांमुळे शिंदे नाराज झालेत. त्यांचे 20 आमदार मागेच त्यांना सोडण्यासाठी तयार झाले होते. माझ्या मते ते भाजपमध्ये जाण्यासाठी शिवसेना सोडतील. मला त्यांचे काही लोक भेटले. तेव्हा समजले. तुम्ही शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंबाला सोडले, आता तुमच्यासोबतही असेच होईल. ही नाराजी अशीच सुरू राहील. पुढे जाऊन त्यात आणखी भर पडले. त्यानंतर महिना-दोन महिन्यात चित्र खूप बदललेले दिसेल. राजकारणात कोणतीही उलथापालथ होऊ शकते. भाजप या सर्वांना सरळ करेल. त्याची सुरुवात आता झाली आहे. शिंदेंचे नाराज आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातात. पण फडणवीस त्यांना कोणताही थारा देत नाहीत. मुंबईतल्या एका मोठ्या नेत्याने मला ही माहिती दिली. कुणीही गेले तरी फडणवीस त्याचे काम करत नाहीत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व आमदारांना भरभरून द्यायचे. त्यावेळी त्यांना भाजपला देताना हात आखडता घेतला. आता फडणवीस तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांना देत आहेत, असे ते म्हणाले होते.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 12:22 pm

शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंच्या नावाला विरोध:UBT आमदारांना आता 2019 सारखा अनुभव येईल -देसाई; आदित्य ठाकरेंनी चर्चा फेटाळली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद सुपूर्द करण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या नावाला कडाडून विरोध करत आदित्य यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले तर 2019 मध्ये शिवसेना आमदारांना जो अनुभव आला तोच अनुभव आता ठाकरे गटाच्या आमदारांना येईल, असे ते म्हणालेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर येथे सुरुवात झाली. या अधिवेशनात पहिल्यांदाच विधानसभा व विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. विरोधकांनी सरकारवर हे पद हेतुपुरस्सर रिक्त ठेवण्याचा आरोप केला आहे. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेतेपद निवडीचा अधिकार मुख्यमंत्री किंवा सरकारकडे नाही, तर विधिमंडळाचे अध्यक्ष व सभापतींकडे असल्याचे सांगत हा आरोप फेटाळून लावला आहे. काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांचे नाव पुढे केले आहे. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाच्या आमदारांना 2019 चा अनुभव येईल पण आज अचानक राजकीय वर्तुळात विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद भास्कर जाधव यांच्या जागी आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली. यामुळे भास्कर जाधव दुखावले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी आदित्य यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे. ते याविषयी बोलताना म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवणे हे 2019 च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिंमडळाच्या रचनेसारखे झाले. सरकार बनवताना उद्धव ठाकरे यांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितले की, मला तुमच्यातील शिवसैनिक मुख्यमंत्री करायचाय. त्यानंतर मुख्यमंत्रीचा मुद्दा आला तेव्हा त्यांनी स्वतःचे नाव सुचवले. ते स्वतः मुख्यमंत्री झाले. एवढेच नाही तर त्यांनी स्वतःच्या मुलालाही कॅबिनेट मंत्री केले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे येत असेल तर 2019 मध्ये शिवसेना आमदारांना जो अनुभव आला, तोच अनुभव आता ठाकरे गटाच्या आमदारांना येईल, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी फेटाळली चर्चा दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांनी आपण विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मला विरोधी पक्षनेतेपद देण्याची बातमी पेरलेली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे ते म्हणालेत. विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदावरून सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 1980 मध्ये भाजपाचे 14 आमदार होते, 1985 मध्ये 16 आमदार होते. पण तेव्हाही विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. पण नियत नसेल तर त्याला काही बोलू शकत नाही. हे सरकार घटनात्मक पद रिक्त ठेऊन कामकाज करत आहे. हा मनमानी कारभार आहे. तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद नियुक्त करायला काय दुखणे आहे, आम्ही नाव दिले आहे. जो काही असेल तो निर्णय घ्या. लोकशाहीवर आधारित सरकार चालवायचे नसेल तर त्यांना संविधानाप्रमाणे सरकार चालवायचे नाही असा अर्थ होतो. रेटून कारभार करत जनतेला न्याय द्यायचा नसेल. सरकारच्या गैरप्रकारावर कुणी अंकुश ठेवू नये असं वाटत असेल तर त्यांनी करू नये, असे ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 11:57 am

प्रवचनातून झालेला वाद, काडसिद्धेश्वर स्वामींविरोधात तक्रार:जात-धर्मिय भावना दुखावल्याच्या आरोपाखाली स्वामींवर गुन्हा

कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर यांच्यावर, गडचिरोली जिल्ह्यातील बिळूर येथे केलेल्या प्रवचनातील विधानांमुळे जात-धर्मिय भावना दुखावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना चर्चेचा विषय बनली असून, त्यांच्या विरोधात न्यायव्यवस्थेत काय कारवाई होईल, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. गडचिरोली आणि जत येथील बिळूर गावावरून प्रसिद्ध असलेल्या कणेरी मठाचे स्वामी काडसिद्धेश्वर यांच्या विरोधात जात-धर्म व समाजभावना दुखावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. बिळूर परिसरातील एका सामाजिक संघटनेने दिलेली तक्रार पोलिसांनी मान्य करून, संबंधित गुन्हा नोंदवला आहे. असे म्हटले जाते की, स्वामी यांच्या एका प्रवचनात त्यांनी कर्नाटकमधील लिंगायत समाज आणि धर्म-आरक्षण याविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे काही नागरिकांची भावना दुखावली गेली. या प्रकरणाची तक्रार प्रथम कर्नाटकमधील बसवन पोलिस ठाण्यात दाखल झाली होती; पण पुढे ती जळगावजमोड येथील जत पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. बिळूर मठात 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या प्रवचनातले विधान हे तक्रारीचे केंद्र असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तक्रारीनुसार, समाजात एकोप्याला धक्का देणारे, विभाजन पेरणारे विधान केले गेले; त्यामुळे गुन्ह्याची नोंद झाली. गुन्हा दाखल झाल्यानंतर काडसिद्धेश्वर स्वामी यांनी विरोधकांनी राजकीय दबावाखाली तक्रार दाखल केली असल्याचा आरोप केला आहे. माझ्या प्रवचनात काहीही असा बोलले नाही, मी फक्त सत्य बोललो, असे त्यांनी म्हटले. तसेच सांगितले की, समाजात वाद लावणे, तोडणे हे माझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. हे गुन्हे दाखल करणे हा खोडसाळपणा आहे. स्वामींच्या कार्यपद्धतीत समाजातील एकोपा, आत्मनिर्भरता आणि सकारात्मक बदल कणेरी मठाचे पूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी हे समाजासाठी सतत कार्यरत असलेले प्रतिष्ठित आध्यात्मिक नेते मानले जातात. 1989 साली त्यांनी मठाधिपती पदाची सूत्रे हातात घेतली आणि त्यानंतर आरोग्य, शिक्षण, शेती, संस्कृती व ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामे सुरू केली. समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास आणि दुर्बल कुटुंबांना सक्षम बनवणे हे त्यांचे मुख्य ध्येय राहिले आहे. 1991 पासून कणेर्‍या गावाला त्यांनी आपली कर्मभूमी म्हणून स्वीकारले आणि गाव विकासासाठी सरकारवर अवलंबून न राहता गावकऱ्यांनीच पुढाकार घ्यावा, हा संदेश दिला. विशेषतः युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. स्वामींच्या कार्यपद्धतीत समाजातील एकोपा, आत्मनिर्भरता आणि सकारात्मक बदल यांना नेहमीच सर्वोच्च स्थान दिले जाते. त्यांच्या या कार्यामुळे ते ग्रामीण विकासाचे प्रेरणास्रोत बनले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 11:47 am

संभाजीनगरची बेंगळुरू, मुंबई विमानसेवा 15 पर्यंत स्थगित:सॉफ्टवेअरच्या बिघाडामुळे निर्णय, ‘सचखंड’सह विमानेही ‘लेट’

ऐन पर्यटन हंगामात छत्रपती संभाजीनगर शहराची बेंगळूरू आणि मुंबईची महत्त्वपूर्ण विमानसेवा १५ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय इंडिगो प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे पर्यटन व्यावसायिकांसह इतर क्षेत्रांमध्ये संतापाची लाट आहे. यापूर्वी हैदराबादची दुपारची विमानसेवा देखील १५ ते ३१ डिसेंबर दरम्यान स्थगित केली आहे. इंडिगोच्या सॉफ्टवेअरमधील बिघाड तसेच क्रू मेंबरची कमतरता यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. या अडचणींमुळे कंपनी लहान शहरांच्या सेवा खंडित करून मोठ्या शहरांच्या सेवा सुरू ठेवण्यावर भर देत आहे. बेंगळूरू-छत्रपती संभाजीनगर ही आठवड्यातून तीन दिवस असणारी विमानसेवा ९ ते १५ डिसेंबर दरम्यान स्थगित करण्यात आली आहे. तसेच, मुंबई-छत्रपती संभाजीनगर ही सायंकाळची सेवाही १५ डिसेंबरपर्यंत स्थगित केल्याचे प्राथमिक दृष्ट्या स्पष्ट होत आहे. ‘सचखंड’सह विमानेही ‘लेट’उत्तर भारतातील धुक्यामुळे सचखंड एक्स्प्रेस सुमारे ६ तास उशिराने छत्रपती संभाजीनगर स्थानकावर दाखल झाली. रोज सकाळी ९.४० वाजता पोहोचणारी ही रेल्वे रविवारी (७ डिसेंबर) दुपारी ३.४० वाजता स्थानकावर पोहोचली. त्याचबरोबर दिल्लीहून येणारे इंडिगोचे विमान अर्धा तास, तर एअर इंडियाचे सकाळचे दिल्लीचे विमान २० मिनिटे विलंबाने दाखल झाले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 11:34 am

आदित्य ठाकरेंकडे विरोधी पक्षनेतेपद?:भास्कर जाधव यांना वगळून ठाकरेंना संधी मिळण्याची शक्यता; उदय सामंतांनी दिले संकेत

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची आज सुरूवात होत आहे आणि नेहमीप्रमाणेच या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे प्रश्न चर्चेला येणार आहेत. मात्र यंदाच्या अधिवेशनाची सुरुवातच मोठ्या राजकीय तणावाने होत आहे. कारण, महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात हा पहिलाच प्रसंग आहे की, विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद अद्याप निश्चित झालेले नाही. यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचा दावा आहे की, नियमांप्रमाणे निर्णय हा अध्यक्ष आणि सभापती यांनी घ्यायचा असून त्यात सरकारचा हस्तक्षेप नसतो. त्यामुळे या मुद्द्यावरून सुरु झालेली राजकीय खडाजंगी पुढे किती तापेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेतेपद कोणाला द्यायचे यावर मोठे राजकीय गणित सुरू असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आता नवे नाव पुढे केले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांचे नाव या पदासाठी चर्चेत होते. पण आता स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नावाची शिफारस विधिमंडळाध्यक्षांकडे पाठवण्यात आली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या हिवाळी अधिवेशनात युवा नेतृत्वाला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. विरोधी पक्षनेतेपद ही केवळ प्रतिष्ठेची नाही तर सरकारी निर्णयांना थेट आव्हान देण्याची भूमिका असल्यामुळे, या पदावर कोण बसणार हे राज्याच्या राजकारणात प्रचंड महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतरच्या पहिल्या अधिवेशनापासूनच हा प्रश्न चर्चेत आहे. विधानसभेत संख्याबळाच्या आधारे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उद्धव ठाकरे गटाचा अधिकार निर्विवाद असल्याचे महाविकास आघाडीत मान्य करण्यात आले होते. त्यामुळे या पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव पाठवले गेले होते. पण प्रत्यक्ष निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. शिवाय अधिवेशन जसे जवळ येऊ लागले तसे नेतृत्वाबाबत गटात पुन्हा विचार सुरू झाल्याचे समोर आले आहे. आदित्य ठाकरेंना आक्रमक भूमिका, तरुणांतील लोकप्रियता आणि राज्यभरातील आंदोलनांत सक्रिय सहभाग या कारणांमुळे त्यांचे नाव पुढे आणले गेल्याचे बोलले जात आहे. याच मुद्द्यावरून आता नवे राजकीय संकेतही मिळत आहेत. मंत्री उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांच्या नावाबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, जाधव साहेब आक्रमक नेते आहेत. ते पक्ष बदलण्याचा विचार करू शकतात, म्हणून त्यांना शांत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदाचे आश्वासन देण्यात आले. परंतु अंतिम निवड होताना त्यांचा विचार केला जाण्याची शक्यता कमी आहे. सामंतांच्या विधानानेच ठाकरेंच्या गटात नावांबद्दल गंभीर विचार सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत. राजकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हेच विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहतील का, याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. तरुण नेतृत्वामुळे विरोधकांची ताकद अधिवेशनात अधिक प्रभावी होईल, असा विश्वास शिवसेना उद्धव गटाला आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी मात्र या चर्चेवर मौन बाळगले आहे. विरोधी पक्षनेतेपदासंबंधीचा निर्णय अधिकृतरीत्या जाहीर होईपर्यंत राजकीय चर्चांना वेग मिळत राहणार आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर हे पद कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 11:26 am

राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा गीता हिंगे यांचे अपघाती निधन:राजकारण व समाजकार्याची सांगड घालणाऱ्या गीताताईंचा दुर्दैवी मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा गीता हिंगे यांच्या अचानक निधनाची बातमी समोर आली आहे. रविवारी रात्री उशिरा नागपूरवरून गडचिरोलीला परत येताना पाचगाव परिसरात झालेल्या भयंकर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या गाडीला समोरून येणाऱ्या कारने जबर धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. धडक इतकी प्रचंड होती की घटनास्थळीच गीता हिंगे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तर त्यांच्या पतींच्या हाताला झालेली जखम किरकोळ असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात पाठवले. अपघातानंतर पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून अपघाताचे अचूक कारण समोर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गीता हिंगे या गडचिरोली जिल्ह्यातील महिलांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी भारतीय जनता पक्षातून केली. जिल्ह्यातील संघटन बांधणी, जनसंपर्क, महिलांसोबत सतत सक्रिय उपस्थिती यामुळे त्या भाजपमधील लोकप्रिय चेहरा बनल्या. जिल्हा अध्यक्षपद, जिल्हा महामंत्री अशा महत्त्वाच्या पदांची त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. आगामी नगरपरिषद निवडणुकीपूर्वी नगराध्यक्षपदाचे तिकीट नाकारल्याने त्यांनी भाजपचा त्याग केला. मात्र राजकीय प्रवास थांबवता न, नव्या वाटेवर पाऊल टाकत 26 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. पक्षात दाखल होताच त्यांची महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटनेला नवी उमेद मिळेल, नवीन नेतृत्व तयार होईल अशी मोठी अपेक्षा होती. पण त्या अपेक्षांना काळाने क्रूरपणे छेद दिला. राजकारणासोबतच गीता हिंगे या सामाजिक कार्यातही अग्रेसर होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली आधार विश्व फाउंडेशन या संस्थेमार्फत गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला जात होता. कोविड महामारीच्या संकटकाळात त्यांनी वैयक्तिक पुढाकार घेत अनेक गरजू नागरिकांना अन्नधान्य, औषधे व आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. समाजातील वंचित घटकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी त्यांनी दिवसरात्र धावपळ केली. मुलांचे शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण, आरोग्यविषयक शिबिरे, रक्तदान उपक्रम अशा अनेक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यांच्या या मानवसेवेची दखल सर्व स्तरांवर घेतली गेली आणि त्यांची कार्यशैली जनतेच्या मनात घर करून गेली. गीता हिंगे यांच्या निधनाने गडचिरोलीने एक कार्यक्षम, मनमिळावू, नि:स्वार्थी आणि जिद्दी नेतृत्व गमावले आहे. लोकांशी संवाद साधण्याची त्यांची सहज पद्धत आणि समस्यांकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रत्येक घरात आपुलकीचे नाते जोडण्यात यशस्वी ठरल्या होत्या. अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी त्या नेहमी पुढे असायच्या. नेतृत्वाचा हा उज्वल प्रवास अचानक थांबला याचे दु:ख व्यक्त करण्यास शब्द अपुरे पडतात. त्यांच्या जाण्यामुळे झालेल्या पोकळीची भरपाई होणे कठीण आहे, असे अनेक स्थानिक नागरिक सांगत आहेत. नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला या दुर्घटनेने संपूर्ण राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सर्वच पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना व पक्ष बांधवांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी अशा भावना सर्व स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत. गीता हिंगे यांचा जनतेशी असलेला जवळचा नातेसंबंध, राजकीय समर्पण आणि सामाजिक बांधिलकी कायम स्मरणात राहील.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 11:08 am

शिरजगाव मोझरीला बिबट्याचा वावर; श्वानांच्या पिलांची शिकार:भीतीमुळे शेतकऱ्यांचे कापसाचा वेचा आणि पेरणीचे काम ठप्प‎

प्रतिनिधी | तिवसा येथील कोळवण परिसराच्या पाणंद रस्त्यावरील राजेंद्र कडू यांच्या शेतातील कुत्र्याच्या पिलाची बिबट्याने शिकार केली. या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थनिकांच्या मते गेल्या ८ दिवसांपासून शिरजगाव मोझरी गावातील नागरिकांना सभोवताली बिबट दिसून येत आहेत. बिबटाच्या अशा वावरामुळे शेतातील कामे ठप्प झाली आहेत. रब्बीची पिक पेरणी, कापसाचा वेचा आणि पिकांचे ओलीत थांबले असल्याने शेतकरीही अडचणीत सापडला आहे. आज सकाळच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर या भागात बिबट्याचे ठसेही आढळून आले. त्यानंतर येथील काही तरुणांच्या आग्रहाखातर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ड्रोनच्या आधारे सदर बिबट्याचा शोध सुरु केला. परंतु अद्याप काहीही सापडले नाही. यावेळी वनपाल खेडकर, वनरक्षक जांभे व गवई, वनमजूर गजानन राऊत यांच्यासह स्थानिक शेतकरी देवेंद्र घाटोळ, सागर बालपांडे, रवी जामगडे, अनुप वैद्य, प्रशांत शेंडे, सतीश बेहरे, धनराज शेलोकार, विनोद मेश्राम, विक्रम मोहोड, प्रमोद सहारे, प्रथमेश कडू, प्रशांत कांबळे आदी गावकरीही उपस्थित होते. आज, रविवारी दुपारी १२ वाजताच्याा दरम्यान शिरजगाव मोझरी गावातील कोळवण परिसर, शिवणगाव, परिसर, वऱ्हा पाणंद रस्ता परिसर आणि गावाच्या सभोवताल बिबट्याची पाहणी केली. परंतु बिबट कोठेही आढळून आला नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वनविभागाच्या अंदाजानुसार सदर बिबट्या धोत्रा, सालोरा शिवारात गेल्याची शक्यता आहे. दरम्यान कोळवण परिसरातील राजेंद्र कडू यांच्या शेतात ज्या दिशेने ठसे उमटलेले दिसून आलेत आणि ज्या दिशेने दोन पिल्यांची शिकार दिसून आली आहे. तो मार्ग धोत्रा सालोरा शिवाराकडे जातो. त्यामुळे कोळवण शिवारातील बिबट पुढे सरकला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चांदूर रेल्वेकडेही तक्रार बिबट्याने दोन पिल्लांची शिकार करून पुढे गेल्याची शक्यता वनविभागाने वर्तवल्यानंतर आरएफओ शीतल धुते यांच्याकडे येथील युवा कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी वनविभागाकडे तक्रार करून तातडीने धोत्रा, सालोरा शिवारात सर्च ऑपरेशन राबवण्याची मागणी केल. त्यानंतर दुपारी ३ वाजताच वनकर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पाहणी करण्याचे आदेश दिल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:55 am

दिव्य मराठी अपडेट्स:पालघर पोलिस ठाण्यात महिलेवर बलात्कार; तक्रारीच्या बहाण्याने बोलावणाऱ्या कॉन्स्टेबलला अटक

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:55 am

पत्नीने ३० लाखांच्या वादात पतीचे गोदामच दिले पेटवून:पैशांच्या वादात पत्नीची धक्कादायक कृती : २५ लाखांचे नुकसान‎

प्रतिनिधी | अमरावती शहरात राहणाऱ्या एका ४४ वर्षीय व्यावसायिकाचे पत्नीसोबत पटत नाही. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून पती, पत्नी एकत्र राहत नाहीत. दरम्यान त्या व्यावसायिकाच्या पत्नीने त्याला फोन करुन ३० लाख रुपये मागितले. रक्कम न दिल्यास सीट कव्हरचे गोदाम जाळून टाकेल, अशी धमकी दिली. त्याने रक्कम देण्यास नकार दिला. त्यानंतर काही वेळातच पत्नीने पतीच्या गोदामाला आग लावली. या आगीमुळे जवळपास २५ लाख रुपयांचे साहीत्य जळून खाक झाल्याची तक्रार पतीने पोलिसात दिली. या तक्रारीवरुन राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आग लावणाऱ्या महिलेविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. ७) दुपारी दसरा मैदान परिसरात घडली आहे. तक्रारदार व्यक्तीचे नाव मनिष असून त्यांचे शहरातील दसरा मैदानासमोर सीटकव्हरचे दुकान व त्याच ठिकाणी कुशन, वाहनांच्या ऑडीओ, व्हिडीओ सिस्टीम विक्रीचे गोदाम आहे. मनिष व त्यांच्या पत्नीचे मागील तीन वर्षांपासून पटत नाही. त्यामुळे त्यांची पत्नी मुलीसह दिल्लीला राहते. दरम्यान २ डिसेंबरला मनिष यांच्या पत्नीने त्यांच्या दुकानात जाऊन ५० लाख रुपयांची मागणी केली. न दिल्यास प्रॉपर्टी जाळून टाकू, अशी धमकीसुद्धा दिली होती. त्यानंतर सहा डिसेंबरला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मनीष हे दुकानात असतानाच त्यांची पत्नी व तीच्यासोबत दिल्लीतील एक मैत्रीण या दोघी दुकानात आल्यात. ३० लाख रुपये मनिष यांना मागितले, मात्र मनीष यांनी पैसे देण्यास नकार दिला. सात डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजता मनिष त्यांच्या भावाच्या घरी असताना आग लावली. काही वेळातच गोदाम असलेल्या इमारतीमधील एका परिचिताने मनिष यांना फोन करून सांगितले की, तुमच्या पत्नीने गोदामाला आग लावलेली आहे. त्यामुळे मनिष तातडीने गोदामाजवळ पोहोचले. या आगीत एकूण २५ लाख रुपयांच्या साहीत्यांचे नुकसान झाल्याचे त्यांनी पोलिस तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी मनिष यांची पत्नी व तिच्या एका मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मुलीच्या गळ्यावर रक्त दिसणारे फोटो पाठवले मनिष यांच्या पत्नीने त्यांना सोशल मीडियावर त्यांच्या मुलीच्या गळ्यावर रक्त आहे असे चित्र दिसेल, अशा पद्धतीचे फोटो तयार करुन पाठवले. त्यानंतर मनीष यांनी तत्काळ पोलिसांच्या मदतीने असे काही घडले आहे का? याबाबत घटनेची शहानिशा केली. मात्र तसे काही नसून ते फोटो बनावट असल्याचे समोर आले होते.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:55 am

१६९ दात्यांनी रक्तदानातून दिली बाबासाहेबांना आदरांजली:कार्यक्रमांद्वारे दिल्या संविधानाच्या उद्देशिका; प्रश्नमंजूषा स्पर्धेचेही करण्यात आले आयोजन‎

प्रतिनिधी | अकोला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अशोक वाटिका येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १६९ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. शिबिर वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई मित्र परिवार, अॅड. आकाश भगत मित्र परिवार, अकोला बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम, प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांमध्ये संविधानाच्या उद्देशिका देऊन प्रश्नमंजूषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान अशोक वाटिका येथे महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. प्रा. प्रसन्नजित गवई, नंदकुमार डोंगरे, प्रमोद देंडवे, गजानन गवई, ॲड. मोतीसिंह मोहता, वंदना वासनिक, विद्या देशमुख, सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे ठाणेदार संजय गवई, मनोरमा गवई, खदानचे ठाणेदार मनोज केदारे आदी उपस्थित होते. शिबिरात पोलिस कर्मचारी राजेश वानखडे व त्यांची पत्नी भारती वानखडे यांनी रक्तदान केले. अनेक युवकांनी आपल्या आयुष्यातील प्रथमच याच शिबिरात रक्तदान करून ज्ञानाच्या अथांग महासागरास अभिवादन केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपिढीने रक्त संकलनाचे कार्य केले. रक्तदात्यांमध्ये राहुल तायडे, राज गावंडे, दीपक तायडे, पंकज दामोदर, अजय वानखडे, यश इंगळे, शुक्लोदन वानखडे, संतोष खंडारे, नकुल जोहार, हर्षल वानखडे आदी होते.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:52 am

हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस:दोन्ही सभागृहांचे कामकाज 'विरोधी पक्षनेत्या'विना, आज पुरवणी मागण्या सादर होणार

उपराजधानी नागपूरमध्ये आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र, यंदा विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे कामकाज विरोधी पक्षनेत्याशिवाय चालणार आहे. विरोधकांकडे संख्याबळ नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. विरोधी पक्षनेता नसला तरी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, राज्यातील वाढती गुन्हेगारी, महिलांवरील वाढते अत्याचार आणि तरुणांच्या हाताला नसलेला रोजगार या मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज दोन्ही सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. त्यानंतर शासकीय कामकाज आटोपून शोकप्रस्ताव मांडला जाईल आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले जाईल. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवर दिसणार का आणि सरकार जनतेला खूश करण्यासाठी काही नवीन घोषणा करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:38 am

सेनगावात 10 हजार रुपयांसाठी एकावर तलवारीने प्राणघातक हल्ला:तीन जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

सेनगाव येथे १० हजार रुपये परत का मागितले या कारणावरून एकावर तलवार व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी तिघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात रविवारी ता. ७ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून अन्य एका आरोपीचा शोध सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील चिखलागर येथील शेकुराव गडदे यांना बोरकर नावाच्या व्यक्तीला १० हजार रुपये उसनवारीवर दिले होते. त्यानंतर गडदे यांनी बोरकर यांना १० हजार रुपये परत मागितले होते. मात्र त्याने पैसे देतो असे सांगितले. त्यानंतर गडदे हे चिखलागर येथून सेनगाव येथे आले असतांना येलदरी टी पॉईंटवर दिलीपसिंग, गौतम जाधव व रोशन उर्फ गोलू कुऱ्हे यांनी गडदे यांची कार अडविली. यावेळी त्यांनी बोरकर यांना दिलेले पैसे परत का मागितले या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरवात केली शाब्दिक चकमकी नंतर वाद वाढत गेला. त्यानंतर दिलीपसिंग याने त्याच्या जवळील तलवारीने गडदे यांच्या डोक्यात वार केला त्यानंतर लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. अचानक झालेल्या मारहाणीमुळे गडदे यांना प्रतिकार करण्याची संधीही मिळाली नाही. तु पुन्हा सेनगाव येथे आला तर जिवे मारु अशी धमकी देण्यात आला. यावेळी मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या गडदे यांना तेथेच सोडून तिघांनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार सुभाष चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व गावकऱ्यांनी जखमी गडदे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाख केले. या प्रकरणी गडदे यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी दिलीपसिंग, गौतम जाधव, रोशन उर्प गोलु कुऱ्हे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गौतम व रोशन यांना अटक केली असून दिलीपसिंग याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपनिरीक्षक खंदारे पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:37 am

कृषी:शेतकऱ्याने तयार केलेल्या ‘जुन्नर गोल्ड’ या आंबा वाणाला ‘शेतकरी जात’ म्हणून मान्यता; प्रयोगातून घडवलेला शेतकरी-ब्रँड आता झळकणार भारतीय वाणांच्या नकाशावर

प्रतिनिधी | आळेफाटा जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडीचा प्रयोगशील शेतकरी भरत जाधव यांनी तयार केलेल्या ‘जुन्नर गोल्ड’ या अनोख्या आंबा वाणाला दिल्लीतील केंद्र शासनाच्या 'प्रोटेक्शन ऑफ प्लॅन्ट व्हरायटी अँड फार्मर्स राईट अथोरिटी' (पीपीव्ही अँड एफआरए ) या संस्थेकडून हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. प्रयोगातून घडवलेला शेतकरी-ब्रँड आता अधिकृतपणे भारतीय वाणांच्या नकाशावर झळकणार आहे, हेच त्याचे वैशिष्ट्य. नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली या वाणाची वैज्ञानिक तपासणी, प्रयोगशाळा अहवाल आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दोन वर्षांच्या प्रयत्नांना आता केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. ‘जुन्नर गोल्ड’चा प्रसार आणि हक्क आता अधिकृतरीत्या भरत जाधव यांच्याकडे राहणार आहेत. गेल्या २२ वर्षांपासून दोन हेक्टर जिरायत जमिनीत आंब्याची बाग उभी केलेल्या जाधव यांच्या बागेत ४०० हून अधिक विविध वाणांची झाडे आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि सातत्यपूर्ण प्रयोगशीलता यांच्या जोरावर त्यांनी ‘जुन्नर गोल्ड’ घडवला आणि आता तो राष्ट्रीय मानांकनापर्यंत पोहोचला. आता ‘जुन्नर गोल्ड’ फक्त स्थानिक वाण नाही; तो शेतकऱ्याने घडवलेला राष्ट्रीय दर्जाचा आंबा आहे. जाधव यांच्या या बागेत हापूस, केशर आणि राजापुरी या तिन्ही जातींची संमिश्र चव असलेली आंब्याची काही झाडे असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांना दोन वर्षापूर्वी मिळाली होती. या वैशिष्ट्यपूर्ण आंबा वाणाची माहिती घेण्यासाठी अध्यक्ष मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रातील उद्यानविद्या विषयतज्ञ भरत टेमकर, पीक संरक्षण विषयतज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी विकसित पीक जाती संरक्षण कायद्या अंतर्गत नोंदणीसाठी प्रस्ताव तयार केला. यासाठी लागणारी तांत्रिक माहिती, प्रयोगशाळेतील नमुन्यांचे पृथक्करण आणि नाशिक येथील फळ व अन्न पदार्थ तपासणी करणाऱ्या 'अश्वमेघ इंजिनिअर्स व कन्सल्टट' यांच्या प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेला अहवाल आदि बाबींची पूर्तता करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. अहिल्यानगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादनाकडे वळाला आहे. त्यात केशर वाणाला मोठी पसंती मिळते. आता जुन्नर गोल्ड या वाणाच्या यशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातही शेतकरी या वाणाकडे वळण्याची शक्यता आहे. हे आहे ‘जुन्नर गोल्ड’ आंब्याचे वैशिष्ट्ये एका फळाचे वजन तब्बल ९००-९७० ग्रॅम, हापूस,केशर, राजापुरी या तिन्हींचा मिश्र स्वाद,राजापुरीसारखा भव्य आकार आकर्षक, चमकदार केसरी रंग,पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने उत्पादन. रंग : आकर्षक केसरी रंग उत्पादन : दरवर्षी फळधारणा होणारे वाण

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:20 am

भानसहिवरे शाळेत दिव्यांग सप्ताह अंतर्गत क्रीडा स्पर्धा:शाळेचे मुख्याध्यापक राजेश जगताप यांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

प्रतिनिधी |नेवासेफाटा भानसहिवरे (ता.नेवासे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात आला. नेवासे पंचायत समितीचे विशेष शिक्षक सचिन खारगे यांनी दिव्यांगाच्या योजनाची माहिती यावेळी उपस्थितांना देवून दिव्यांग प्रमाणपत्र काढणे विषयी विशेष मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक राजेश जगताप यांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये लिंबू चमचा,सुई दोरा ओवणे,पोता शर्यत,तीन पायाची शर्यत,संगीत खुर्ची,गीत गायन,वकृत्व,हस्ताक्ष र अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र पाचे,श्रीधर साळुंके,महेश देवतरसे,दत्ता चौथे,अशोक ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे परीक्षक म्हणून शाळेतील शिक्षिका आशा गवळी, सुमन सोळसे, वर्षा कुऱ्हाडे यांनी काम पाहिले मान्यवरांच्या उपस्थितीत पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना शालेय साहित्य देऊन सन्मान करण्यात आला. स्पर्धा यशस्वीपणे राबवल्याबद्दल नेवासे तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, विस्ताराधिकारी मीरा केदार,केंद्रप्रमुख रवींद्र कडू यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:19 am

जिर्णोद्धार कामाला वेग, आतापर्यंत पंचवीस फुटापर्यंत मंदिराची उभारणी:परभणी जिल्ह्यातील दहा कारागीर करताहेत काम

प्रतिनिधी |पाथर्डी शहर तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत चैतन्य कानिफनाथ मंदिर जिर्णोद्धाराच्या कामाला वेग आला आहे. लोकसहभागातून सुमारे सहा कोटी रुपये खर्च या मंदिर उभारणीच्या कामासाठी केला जाणार आहे. हेमांडपंथी स्वरूपाचे हे दगडी मंदिर आहे. उभारणीसाठी लागणारा संपूर्ण दगड नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आणला जात आहे. श्रीक्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथांची संजीवन समाधी आहे. राज्यातील लाखो भाविक मढीला नाथांच्या दर्शनाला जाण्या अगोदर बहुतांश भाविक मिरी येथील चैतन्य कानिफनाथांच्या भूमीचे दर्शन घेतात आणि त्यानंतरच पुढे मढीकडे मार्गस्थ होतात. त्यामुळे मिरी येथील चैतन्य कानिफनाथ देवस्थानला देखील महत्त्व आहे. देवस्थान कमिटी, मिरी ग्रामस्थ व भाविक भक्त यांच्या लोकसहभागातून या ठिकाणी हेमाडपंथी स्वरूपाचे दगडी बांधकामात मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत पंचवीस फुटापर्यंत दगड कामात मंदिराची उभारणी झाली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील दहा कारागीर दररोज या ठिकाणी दगडाची घडई आणि जुडईचे काम वेगाने करत आहेत. एक कारागीर दिवसभरात तीन ते चार दगडांना आकार देण्याचे काम करत आहे. काळपट रंगाच्या दगडांमध्ये या मंदिराची संपूर्ण उभारणी सुरू असून मंदिराचे काम वेगाने सुरू असल्याने नवीन मंदिर देखील आता भाविक भक्तांच्या नजरेत शोभून दिसत आहे. मिरी येथे लोकसहभागातून चैतन्य कानिफनाथ मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून मंदिराची उंची सुमारे ८० फूट आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मंदिराच्या इतर बांधकामासाठी देखील मोठा खर्च अपेक्षित असल्याने भाविक भक्तांनी मंदिराच्या उभारणीसाठी देवस्थान कमिटीकडे आर्थिक स्वरूपात मदत करावी असे आवाहन कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष अशोक झाडे,खजिनदार बहिरू गुंड यांनी केले आहे. या मंदिराच्या प्रत्येक दगडावर कोरीव काम केले जात आहे. दिवसभरात एक कारागीर तीन ते चार दगड घडवण्याचे काम करतो. या कोरीव घडई आणि जुडईच्या कामासाठी खूप मोठा वेळ लागत असल्याचे कारागीर रमेश गुट्टे,विष्णू नरवड,सुभाष गोंडवड यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:19 am

भाविकांची उपस्थिती अन् गावागावात दत्त नामाचा जयघोष:चांदा व परिसरात दत्त जयंती उत्साहात साजरी, दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी‎

प्रतिनिधी|चांदा नेवासा तालुक्यातील चांदा व परिसरात दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साही वातावरणामध्ये पार पडला. यानिमित्त श्री दत्त साधकाश्रम या ठिकाणी सप्ताहाच्या सांगता प्रसंगी उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने दत्त जन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली. या कीर्तनाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आला. श्री दत्त साधकाश्रम या ठिकाणी बाहेरगावचे हजारो भाविक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतात. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चांदा या ठिकाणी देखील दत्त जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. दुसऱ्या दिवशी येथील केंद्रातील कार्यक्रमाची महाप्रसादाने सांगता झाली. तसेच डॉ. विकास दहातोंडे यांच्या मळ्यामध्ये दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या ठिकाणीही उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. चारी नंबर सहा या ठिकाणी जावळे वस्तीवर दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. या ठिकाणी देखील भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आला. फकीरवाडी परिसरात नवनाथ बाबा पुंड वस्ती या ठिकाणी दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते शेवटी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला. श्री दत्त साधकाश्रम या ठिकाणी हभप उद्धव महाराज मंडलिक यांच्या कीर्तनाने जन्मोत्सव सोहळा व सप्ताहाची सांगता झाली. उद्धव महाराज मंडलिक यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागात दिसला दत्त जयंतीचा उत्साह चांदा आणि आसपासच्या गावांमध्ये दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील मंदिरांत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदीर व्यवस्थापनाकडून जयंती सोहळ्याचे नियोजन केले जात होते. भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात होती.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:18 am

महाराष्ट्र राज्य संघात नगरचा खेळाडू शौर्य देशमुखची निवड:१६ वर्षांखालील महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल सत्कार

प्रतिनिधी|अहिल्यानगर येथील एस के क्रिकेट अकॅडमीचा अष्टपैलू खेळाडू शौर्य सम्राट देशमुख याची १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव गणेश गोंडाळ, डॉ. हर्षवर्धन तन्वर, प्रशिक्षक संदीप आडोळे, करण कराळे, केशव नागरगोजे, सम्राट देशमुख, उषा देशमुख आदी उपस्थित होते. अहिल्यानगरमध्ये विविध क्रीडा क्षेत्रामध्ये चांगले खेळाडू असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची खरी गरज आहे क्रिकेट या खेळामध्ये एकग्रता मेहनत, जिद्द, चिकाटी ज्या खेळाडूंमध्ये असेल तो यशाचे शिखर नक्कीच गाठेल. शौर्य देशमुख हा अष्टपैलू खेळाडू असून आतापर्यंत त्याने क्रिकेट क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली असून तो तितकाच नम्र देखील आहे. आता त्याची १६ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये निवड झाल्याचे डॉ. हर्षदवर्धन तन्वर यांनी यावेळी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:17 am

विविध स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडू घडत असतात - आ. संग्राम जगताप:बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन, २७ संघांचा सहभाग‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर आपल्या जिल्ह्यातील आणि शहरातील क्रिकेट या खेळामध्ये खेळाडू घडविण्याचे काम सुरू असून क्रिकेटचे धडे देण्याचे काम बाळासाहेब पवार स्मृती करंडक स्पर्धेच्या माध्यमातून होत असते. या स्पर्धेतील क्रिकेटर किरण चोरमले, अनुराग कवडे यांनी आपल्या खेळाच्या माध्यमातून भारतीय संघामध्ये स्थान मिळवले ही कौतुकास्पद बाब आहे. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडत असतो. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडत असून क्रिकेट प्रेमी या स्पर्धेचा आनंद घेत असतात. बाल वयातच टर्फ विकेटवर चांगला खेळाडू निर्माण होत असून आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे शहराचे नावलौकिक होत आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. नगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आ. जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रणजीपटू अनुपम संकलेचा, शहर बँकेचे उपाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, डॉ. हर्षवर्धन तनवर, सुमतीलाल कोठारी, डॉ. अमित सपकाळ आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील २७ संघांनी सहभाग घेतला असून या स्पर्धेमध्ये ४०० पेक्षा जास्त खेळाडू खेळणार असून ही स्पर्धा २४ दिवस चालणार आहे. ही स्पर्धा आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली होत असून चांगले खेळाडू निर्माण केले होत आहेत. राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर खेळाडू खेळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सुमतीलाल कोठारी म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्याला क्रिकेटची ओळख स्व. माजी आमदार अरुण जगताप यांनी करून दिली. पूर्वी या खेळाकडे कोणीही लक्ष देत नव्हते, हा खेळ शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम काकांनी केले. बाळासाहेब पवार यांनी स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटची ओळख निर्माण करून दिली. आज आपल्या शहरांमध्ये विविध वयोगटातील स्पर्धेचे आयोजन करून बालवायातच मुलांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले जाते ही कौतुकास्पद बाब आहे, या माध्यमातून चांगले खेळाडू निर्माण होतील असे ते म्हणाले. दरम्यान, या जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण २७ क्रिकेट संघांनी सहभाग घेतला आहे. वाकोडी येथील साईदीप मैदानावर १२, १४ आणि १६ वर्षांखालील क्रिकेट संघांचे सामने होणार असल्याची माहिती स्पर्धेच्या आयोजकांनी यावेळी दिली. या स्पर्धेतील सामने आता सुरू झाले आहेत. या सामन्यांसाठी नागरिकही मोठी गर्दी करत आहेत. जवळपास २४ दिवस या स्पर्धा सुरू राहणार आहेत. स्पर्धेमध्ये २७ क्रिकेट संघांचा सहभाग या जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण २७ क्रिकेट संघांनी सहभाग घेतला आहे. वाकोडी येथील साईदीप मैदानावर १२, १४ आणि १६ वर्षांखालील क्रिकेट संघांचे सामने होणार असल्याची माहिती स्पर्धेच्या आयोजकांनी यावेळी दिली.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:16 am

पूर्व वैमनस्यातून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू:जांभळी गावात खळबळ

प्रतिनिधी |पाथर्डी शहर तालुक्यातील जांभळी गावात रविवारी सकाळी दोन गटांमध्ये उसळलेल्या हाणामारीत दिलीप अश्रुबा आव्हाड (वय ३५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पूर्वीच्या वैमनस्यातून सुरू झालेल्या या भांडणात धारदार शस्त्रे, लाठ्या-काठ्या व दगडांचा वापर झाला. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे जांभळी गावात खळबळ उडाली आहे. सकाळी अकराच्या सुमारास जांभळी गावातील दोन कुटुंबांतील जुन्या वैमनस्यातून वाद चिघळला. हा वाद मारामारीत परावर्तीत झाला. मारहाणीत दिलीप आव्हाड गंभीर जखमी झाले. त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या हाणामारीत दुसऱ्या गटातील सोमनाथ भगवान आव्हाड यांच्या पोटात चाकूने वार करण्यात आला. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:16 am

संगमनेरात स्ट्राँग रुमचे कॅमेरे एक तास बंद:उमेदवारांची घटनास्थळी धाव, नागरिकांत संभ्रम

मोहित मंडलिक, सीसीटीव्ही तज्ज्ञ. प्रतिनिधी |संगमनेर संगमनेर नगर पालिकेसाठी झालेल्या मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्राँग रूम मध्ये ठेवण्यात आले आहेत. मात्र या स्ट्राँग रूमवर नियंत्रण करणारे सीसीटीव्ही कॅमेरे रविवारी एक तास बंद झाल्याने शहरात संभ्रम निर्माण झाला आहे. याप्रकारामुळे सर्व उमेदवारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्राँग रूम मध्ये संगमनेरातील एक ते पंधरा प्रभागांतील ईव्हीएम मशीन ^ स्ट्रॉंग रूम मध्ये आठ आठ कॅमेऱ्याचे दोन सेट आहेत. त्यामुळे एका सेटची हार्ड डिस्क बदलली. मात्र एक सेट चालूच असल्याने रेकॉर्डिंग सुरूच आहे. मतमोजणी लांबल्याने हार्ड डिस्क कॅपॅसिटी संपत आली आहे. त्यामुळे ती बदलणे गरजेचे होते. स्ट्राँग रूम बाहेर एलईडी स्क्रीन उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना दाखवण्यासाठी ठेवली आहे. त्यातून लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. - धीरज मांजरे , तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी . ठेवले आहेत. हे ईव्हीएम सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी व शासकीय प्रतिनिधी यांच्या साक्षीने बंद करण्यात आले आणि त्यावर सीसीटीव्ही लावले आहेत. मात्र रविवारी हे उर्वरित पान ४ रेकॉर्डिंग बॉक्स किती चॅनल्सचा आहे. किती दिवसांसाठी त्याची रेकॉर्डिंग हवी आहे. त्यानुसार हार्ड डिस्क ठेवायची होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर २१ तारखेला मतमोजणी होणार होती. तर दोन तारखेलाच हार्ड डिस्क बदलणे गरजेचे होते. हार्ड डिस्क ज्या कंपनीची आहे. त्यानुसार त्याची कॅपॅसिटी ठरलेली असते. ज्याने हे काम पाहिले. त्याने प्रशासनाला ही माहिती देऊन हार्ड डिस्क वेळीच बदलणे गरजेचे होते.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:15 am

उंदिरगावात सलग दुसऱ्या‎दिवशी पकडला बिबट्या‎:दोन्ही बिबटे डिग्रस नर्सरीत स्थलांतरित‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर अहिल्यानगर शहरात केडगाव येथील बिबट्या जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्याला बिबट्याने गुंगारा दिला आहे. तर दुसरीकडे श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगावात एकाच ठिकाणी दोन दिवसांत दोन बिबटे जेरबंद झाले आहेत. या भागात आणखी बिबटे असल्याचा अंदाज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार पिंजरा पुन्हा लावण्यात आला आहे. केडगाव उपनगरात शाहूनगर भागात, हजारे वस्तीवर बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले. वनविभागाच्या पथकाने वस्तीवरील शेतात पिंजरा लावला आहे. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे रात्री गस्त सुरू आहे. परंतू, बिबट्या जेरबंद झाला नाही. दुसरीकडे श्रीरामपूर तालुक्यात मात्र, बिबट्यांचा उपद्रव वाढला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव शिवारात बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याची घटना ४ डिसेंबरला समोर आली होती. या ठिकाणी वनक्षेत्रपाल निलेश रोडे यांच्या निर्देशानुसार वनपाल विठ्ठल सानप, वनरक्षक अक्षय बडे, राहूल कानडे, विलास डगळे यांनी पिंजरा लावला. वाईल्ड लाईफ रेस्क्यू टिमचे प्रा. रोहित बकरे, सार्थक शिंदे, तुषार बनकर आदींनी पिंजरा लावून परीसराची पाहणी केली होती. राजेंद्र पाऊलबुद्धे यांच्या शेतात ५ डिसेंबरला एक बिबट्या जेरबंद झाला. तर दुसरा बिबट्या रविवारी (७ डिसेंबर) जेरबंद झाला. या बिबट्यांना डिग्रस येथील नर्सरीत स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती समजली.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:14 am

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन:यंदा विधान भवनातील अनावश्यक गर्दीला 'चाप'; सभापती अन् उपसभापतींकडून तयारीचा आढावा

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानी सज्ज झाली असून, यंदा विधान भवनातील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. अधिवेशनादरम्यान विनापास प्रवेश करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिला. रविवारी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या आढावा बैठकीला विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, मेघना तळेकर, डॉ. विलास आठवले, शिवदर्शन साठ्ये यांच्यासह विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेचे सीईओ विनायक महामुनी उपस्थित होते. बैठकीनंतर मान्यवरांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली. वेगवेगळ्या रंगांचे पास आणि स्वतंत्र गेट सभापती शिंदे यांनी सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीने आणि कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी गर्दीचे नियोजन करण्यात आले आहे. व्हीआयपींना देण्यात येणारे पास वेगवेगळ्या रंगांचे असतील आणि त्यांच्या प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार (गेट) ठेवण्यात येणार आहेत. विनापास व्यक्तीने विधान भवनात प्रवेश केल्यास त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवास आणि इंटरनेट सुविधेवर भर सभापती आणि उपसभापतींनी रविभवन आणि नागभवन येथील कुटीरमधील व्यवस्थेची पाहणी केली. मंत्री आणि विधिमंडळ सदस्यांच्या निवासाची सोय, इंटरनेट आणि वायफाय सुविधा, आणि आरोग्य सेवेचा आढावा घेण्यात आला. विशेषतः महिला आमदारांची निवास व्यवस्था सुरक्षित आणि सुसज्ज असावी, तसेच राजकीय पक्षांच्या प्रतोदांच्या कार्यालयात वीज, लिफ्ट आणि अग्निशमन यंत्रणा सुरळीत असावी, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. विमानांची गैरसोय टाळण्यासाठी 'नोडल अधिकारी' सध्या विमान सेवेबाबत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, अधिवेशनासाठी येणाऱ्या कोणत्याही सदस्याला उशीर होऊ नये म्हणून एका स्वतंत्र 'नोडल अधिकाऱ्या'ची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, अधिवेशन संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी १४ डिसेंबरच्या रात्री आणि १५ डिसेंबरला विशेष रेल्वे सोडण्याची सूचना रेल्वे विभागाने मान्य केल्याची माहिती सभापती शिंदे यांनी दिली. हे ही वाचा... विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याची परंपरा पाळली:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला, भास्कर जाधवांसह वडेट्टीवारांचाही घेतला समाचार नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विरोधी पक्षांनी या चहापानच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाने परंपरा पाळत बहिष्कार टाकला असे म्हणत खोचक टोला लगावला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 8:59 am

दिंडोरीत राज्यमार्गावरच आठवडे बाजार:अपघाताच्या धाेक्याने नागरिकांचा जीव टांगणीला; बाजारासाठी जागेचे नियाेजन करण्याची मागणी‎

प्रतिनिधी | दिंडोरी शहरात दर रविवारी भरणारा आठवडे बाजार हा सरळ राज्यमार्गावरच भरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यामुळे शहराची लोकसंख्या वाढत असताना बाजारपेठेचे योग्य नियोजन न झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. रविवारच्या बाजाराच्या दिवशी राज्यमार्गावरच गर्दी उसळते आणि त्यातून वाहनेही जातात. एखादे वाहन अनियंत्रीत झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. बाजारासाठी सुरक्षित ठिकाण निश्चित करण्याचे नियोजन अद्याप झालेले नाही. राज्य आणि केंद्र सरकार नगर विकास योजनांमधून मोठा निधी उपलब्ध करून देतात; मात्र प्रत्यक्षात शहरात अपेक्षित विकास झालेला दिसत नाही. उलट वाढत्या अतिक्रमणामुळे बाजारपेठेतील रस्ते अधिक अरुंद होत आहेत. वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असतानाही शहरात पार्किंगची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे वाहनधारक रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या करतात आणि वाहतूक कोंडी वाढते. नागरिक आणि विविध संघटनांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. उड्डाणपुलाचा प्रस्ताव वाढती लोकसंख्या व मालवाहतूक गाड्यांच्या संख्येत वाढ झाली असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. सुरक्षित व अडथळ्याच्या प्रवासावर उपाययोजना म्हणून शहरातून जाणाऱ्या गुजरात राज्य मार्गावरील उड्डाणपुलाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पडून आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 8:40 am

सोयगावला ‘खरी कमाई- आनंद नगरी’ उपक्रम:३६ हजारांची झाली उलाढाल

प्रतिनिधी | सोयगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शनिवारी ‘खरी कमाई- आनंद नगरी’ उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्याध्यापक किरणकुमार पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. शाळेच्या प्रांगणात भरलेल्या या उपक्रमात पालक, गावकरी, माजी विद्यार्थी आणि मान्यवरांचा मोठा सहभाग होता. परिसरात जत्रेचा माहोल निर्माण झाला होता. उपक्रमातून एकूण ३५ हजार ८७५ रुपयांची उलाढाल झाली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली विक्री केंद्रे, कला प्रदर्शन, खेळांचे स्टॉल, खाद्यपदार्थ, हातगुंतीच्या वस्तू, सेवा केंद्रे, तिकीट पद्धतीचे व्यवहार यामुळे पालकांची मने जिंकली. मुलांच्या गणिती कौशल्य, पैशाचे व्यवस्थापन, संवाद कौशल्य, सृजनशीलता आणि आत्मविश्वास पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक धीरज भुरे, केंद्रप्रमुख फिरोज तडवी, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा राधाबाई सोनवणे, सदस्य अण्णा वाघ, रंगनाथ लोखंडे, समाजसेवक कृष्णा पाटील, राजू कुडके, दत्त रोकडे, राजेंद्र दुतोडे, अंकुश पगारे आणि मुख्याध्यापक किरणकुमार पाटील यांची विशेष उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना व्यवहारातील गणित, सहकार्य, जबाबदारी आणि उद्यमशीलतेचा अनुभव मिळाला. पालकांनी मुलांच्या कल्पकतेचे आणि परिश्रमाचे कौतुक केले. महिलांचा सहभागही लक्षणीय होता.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 7:40 am

जायकवाडी वसाहत हटवण्याची कारवाई तूर्तास नाही, आज बैठकीत होईल निर्णय:शाळांचा विचार करून तीन महिने मुदत द्यावी, विद्यार्थ्यांची मागणी‎

प्रतिनिधी | पैठण जायकवाडी शासकीय वसाहतीतील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सोमवारपासून (दि. ८) होणार होती. मात्र ही कारवाई आता पुढे ढकलण्यात आली आहे. सोमवारी विभागीय आयुक्तांकडे पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतरच घरे पाडण्याबात निर्णय घेतला जाणार आहे. जायकवाडी वसाहत कालबाह्य झाली आहे. त्यामुळे ती हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण हटवण्याच्या हालचाली सुरू होत्या. यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार होता. सोमवारी ही कारवाई करण्याची अंतिम तारीख होती. मात्र आता बैठकीत नेमके काय होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या वसाहतीत शाहू विद्यालय आणि प्राथमिक शाळा आहे. येथे सुमारे ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अतिक्रमण हटवले तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे हे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत तरी आम्हाला येथे राहू द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या वसाहतीबाबत आज होणाऱ्या बैठकीत नेमके काय ठरतेय, याकडे वसाहतीसह परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर आंदोलन करू : महिला या वसाहतीत अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात. आमचे संपूर्ण आयुष्य येथे गेले. आता कुठे जायचे, असा प्रश्न शेखलाल भोटकर यांनी उपस्थित केला. हे घर आमचे आधार होते, आता ते राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. जायकवाडी परिसरातील शेकडो महिला आणि विद्यार्थी एकत्र आले. प्रशासनाने पुढील तीन महिने तरी वेळ द्यावी, जेणेकरून मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही महिलांनी दिला.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 7:40 am

भावापाठोपाठ बहिणीचाही झाला मृत्यू, आई-वडिलांना भेटण्याचे स्वप्न अधुरेच:सुटीमुळे गावाकडे जाताना अपघात, करंजखेड्यात एकाचवेळी अंत्यसंस्कार‎

प्रतिनिधी | फुलंब्री आडगाव बुद्रुक गावाजवळ शनिवारी रात्री दुचाकीला पिकअपने जोरदार धडक दिल्याने भावाचा मृत्यू झाला होता, तर बहीण गंभीर जखमी होती. उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला असून, दोघांवरही करंजखेडा येथे एकाचवेळी रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघेही बहीण- भाऊ छत्रपती संभाजीनगर येथे नोकरीला होते. रविवारी सुटी असल्याने ते शनिवारी सायंकाळी गावाकडे दुचाकीवरून जात होते. गणेश संजय सुरडकर (३०) व निशा संजय सुरडकर (२५) अशी मृतांची नावे आहेत. निशा ही छत्रपती संभाजीनगर येथील निमाई हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. गणेश एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. रविवारी दोघांनाही सुटी होती. सायंकाळी सातच्या सुमारास ते दुचाकीने (एमएचक्यू ३२६०) गावाकडे निघाले होते. आडगाव बुद्रुकजवळ समोरून आलेल्या पिकअपने धडक दिली. दोघेही रस्त्यावर पडले. महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिकेचे चालक विजय देवमाळी यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि एक विवाहित मोठी बहीण असा परिवार आहे. पिकअप चालक फरार झाला आहे. या संदर्भात वडोद बाजार पोलिसांचा निष्काळजीपणा दिसून आला आहे. रात्री अपघात घडला असताना वडोद बाजार पोलिस रविवारी सकाळी अपघातस्थळी पोहोचले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 7:38 am

कन्नड पालिकेच्या जागेवर अतिक्रमण, अनेकांनी गाळे बांधून दिले किरायाने:बाळासाहेब पवार चौक, अण्णा भाऊ साठे चौक बनला मृत्यूचा सापळा

राजानंद सुरडकर | कन्नड शहरातील पिशोर नाका, बाळासाहेब पवार चौक, अण्णा भाऊ साठे चौक येथे चोहू बाजूंनी अतिक्रमण झाले आहे. अनेकांनी नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण व बांधकाम करून ती जागा आता भाड्याने दिल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे एका दुकानदाराने तर ३० हजार रुपये भाडे असून मालकाला दिड लाख रुपये डिपॉझिट दिले असल्याचे सांगितले आहे. अण्णा भाऊ साठे चौकात महावीर स्तंभ उभारला आहे. त्याच्या भोवतीही अतिक्रमण करून अनेकांनी दुकाने थाटली आहेत. या स्तंभाला वंदन करण्यासाठीही आता तेथे जाता येत नाही. त्याला लागूनच लोकमान्य टिळक पुतळा आहे. महात्मा फुले पुतळा, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानाभोवतीही अतिक्रमण करून दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यामुळे मुख्याधिकारी शहराच्या बाहेर असलेल्या पाणी शुध्दीकरण प्रकल्पातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानी राहण्यासाठी गेले आहेत. पिशोर नाका येथे नेहमी अपघात घडत आहेत. शहरातून कन्नड- धुळे, सुरत, छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोड अशी प्रवाशी वाहतूक सुरू असते. याच ठिकाणी विविध बॅँका, विविध कार्यालये आहेत. त्यातच ऊसाच्या वाहनांची ये-जा सुरू असते. दररोज अपघात घडत आहे. या ठिकाणी पोलिस चौकी आहे. मात्र वाहतूक कोंडी थांबत नाही. वेळीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या संदर्भात क्षेत्रीय अधिकारी पवन परदेशी म्हणाले की, संबंधित अतिक्रमणधारकांना सोमवारी (दि. ८) नोटीस बजावणार आहे. प्रशांत देशपांडे, पालिका कार्यालयीन अधीक्षक Q अतिक्रमण धारकांवर काय कारवाई करणार? A. चौकशी करण्यात येईल. अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या दोन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कारणा दाखवा नोटीस बजावू. Q अतिक्रमणाकडे डोळेझाक कशी झाली? A. आताही सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभाग यांचेही सहकार्य घेऊन उचित कारवाई करण्यात येईल. Q पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी काय करणार? A. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देवून पुन्हा अतिक्रम करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. आम्ही न्यायालयात जाणार सिद्दीक चौक ते सिध्दीविनायक हॉटेलपर्यंत २८८ जणांनी अतिक्रमण केलेल्या जागेवर दुकाने थाटण्यात आली आहेत. अनेकांनी परस्पर बॉण्ड पेपरवर ते दुसऱ्या दुकानदारांना भाड्याने दिले आहेत. या संदर्भात मी छत्रपती संभाजीनगर न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. नंतर पालिकेने थोडीफार कारवाई केली होती. आता पुन्हा आम्ही न्यायालयात जाणार आहोत. -शेख पाशू, सामाजिक कार्यकर्ते

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 7:38 am

अंचलगाव शाळेला दिले बेंचेस:साई स्वाध्याय मंडळ, गोवा यांच्या सहकार्याने आकर्षक, आधुनिक आणि मजबूत बेंचेस

प्रतिनिधी | लोणी खुर्द वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंचलगाव येथे साई स्वाध्याय मंडळ, गोवा यांच्या सहकार्याने आकर्षक, आधुनिक आणि मजबूत बेंचेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुख्याध्यापक मल्हारी गोसावी यांनी देशपांडे (रत्नागिरी), उमाप (सोलापूर) आणि निचळ (बार्शी) यांचे आभार मानले. या उपक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर व केंद्रप्रमुख सुनील गंगवाल यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन करून शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर कोकाटे, उपाध्यक्ष पांडुरंग वाघचौरे, पंजाबराव साळुंखे, प्रकाश नन्नावरे, योगेश कोळसे, संदीप कंकाळ, विष्णू जाधव, बाळू सुराशे, दादासाहेब निकम आदी उपस्थित होते. वैजापूर तालुक्यातील अंचलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बेंचेस देण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 7:36 am

पैठण आगारातील वाहकाचा प्रामाणिकपणा:हरवलेली पर्स शोधून दिली महिला प्रवाशाला

प्रतिनिधी | पैठण पैठण ते छत्रपती संभाजीनगर या इलेक्ट्रिक बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाची पर्स हरवल्याची घटना घडली. पर्स हरवल्याचे लक्षात येताच त्या महिलेने बसमधील वाहक एकनाथ केदार यांना याबाबत माहिती दिली. प्रामाणिकपणाची आणि दक्षतेची जाणीव दाखवत केदार यांनी तत्काळ संपूर्ण बसची झाडाझडती घेतली. या तपासादरम्यान एका सीटच्या पाठीमागे ती हरवलेली पर्स सापडली. पर्समध्ये महागडा मोबाईल फोन आणि काही रोख रक्कम होती. पर्स सापडल्यानंतर वाहक एकनाथ केदार यांनी कोणताही विलंब न लावता ती पर्स पैठण बस स्थानकावर कार्यरत पोलीस हेड कॉन्स्टेबल खान आणि महिला होमगार्ड यांच्या उपस्थितीत संबंधित महिला प्रवाशाला सुपूर्द केली. आपली हरवलेली पर्स सुरक्षितपणे परत मिळाल्याने त्या महिलेने वाहक एकनाथ केदार यांचे तसेच सर्व एसटी कर्मचारी बांधवांचे आभार मानले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 7:35 am

सिल्लोडमध्ये कॅँडल मार्च:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजन

प्रतिनिधी | सिल्लोड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिल्लोड शहरात शनिवारी कॅँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजता प्रियदर्शनी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराजवळ आंबेडकर प्रेमी एकत्र जमले. रात्री ७.३० वाजता कॅँडल मार्चला सुरुवात झाली. सराफा गल्ली मार्गे हा मार्च डॉ. आंबेडकर नगरातील पूर्णाकृती पुतळ्याजवळ पोहोचून संपला. प्रत्येकाने हाती घेतलेल्या मेणबत्त्या पुतळ्यासमोर लावण्यात आल्या. मेणबत्तीच्या उजेडात परिसर उजळून निघाला. पुतळ्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणे झाली. यावेळी जी. एस. आरके, संजय आरके, रोहित आरके, पवन भूईगळ, अभिषेक आरके, धम्मा आरके, शुभम आरके, सागर आरके, संगीता आरके, सुनिता आरके, निर्मला पाईकराव, जिजाबाई आरके, रत्नमाला भुईगळ, कल्याणी आरके, दगडाबाई उगले, अमिता आरके, सविता आरके उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 7:35 am

एकत्रित वाचन करून विद्यार्थ्यांनी केले डॉ. आंबेडकरांना अभिवादन:महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम‎

प्रतिनिधी | फुलंब्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फुलंब्री येथील न्यू ओअॅसिस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. मुख्याध्यापिका करुणा दांडगे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाषणातून डॉ. आंबेडकरांचे विचार मांडले. सर्व विद्यार्थ्यांनी दहा मिनिटे वाचन करून आगळी श्रद्धांजली वाहिली. राजेंद्र वाघ यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचित, गोरगरिबांसाठी समर्पित केले. ते आजही सर्व समाजाच्या विचारांत जिवंत आहेत. संविधानामुळे देशात एकोपा, शांतता आणि समता टिकून आहे, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला करुणा दांडगे, संघप्रिया पैठने, पूनम दांडगे, अश्विनी जाधव, स्वाती खोजे, स्वाती उंबरकर, इंदू जाधव, प्रियांका गोरे, भाग्यश्री खिल्लारे, पूनम दाभाडे, सपना सोनवणे, माधवराव पाटील, प्रकाश मोटे, सोमनाथ भालेराव, इमरान खान, स्वप्निल बडक, रुपेश ठाकूर, करण खंडारे, रोशन ओइम्बे यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 7:34 am

संकष्टी चतुर्थीला ‘दगडूशेठ’ला 21 पालेभाज्यांची आरास:बाप्पाला महाअभिषेक आणि गणेशयाग अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला संकष्टी चतुर्थीनिमित्त हरित संदेश देणारी अनोखी आरास साकारली. २१ प्रकारच्या ताज्या भाज्यांचा नैवेद्य बाप्पाला दाखवण्यात आला. पहाटे स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केल्यानंतर बाप्पाला महाअभिषेक आणि गणेशयाग अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील मंदिरात केले होते. या भाज्यांचा समावेश मेथी, कोथिंबीर, शेपू, करडई, चवळी, बीट, लाल माठ, लाल व पांढरा मुळा, अंबाडी, पुदिना, कांदापात, कढीपत्ता, चुका, चाकवत, लाल राजगिरा, गवती चहा भाज्यांचा यात समावेश होता.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 7:03 am

जंजाळ यांनी त्यांना हवा असलेला पर्याय शोधावा:पालकमंत्री संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर

‘त्यांनी कुठला पर्याय आहे हे शोधावे. याबाबत मी योग्य वेळी सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. राजेंद्र जंजाळ यांना मी जिल्हाप्रमुख केले हे त्यांनी विसरू नये. या प्रश्नावर निर्णय झाल्यानंतर मी सविस्तर बोलणार आहे,’ असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिरसाट यांनी वापरून घेतले. आता निवडणूक संपल्याचे सांगत तुपे यांना जिल्हाप्रमुख पदाचा पर्याय निवडला जात असेल तर आपल्यालाही पर्याय असल्याचे जंजाळ यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होेते. त्यावर शिरसाट यांनी त्यांनी त्याचा पर्याय निवडावा, असे प्रत्युत्तर दिले. त्र्यंबक तुपे यांना जिल्हाप्रमुख करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, जंजाळ यांना मी जिल्हाप्रमुख केले होते हे त्यांनी विसरू नये, असेही पालकमंत्री म्हणाले. दरम्यान, या वादावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोडगा काढणार आहेत. यापूर्वी श्रीकांत शिंदे यांच्यासोबत जंजाळ यांनी भेट घेतली होती. मात्र, खासदार शिंदे लोकसभा अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संभाजीनगरची बैठक आयोजित केल्याचे सूत्रांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 6:58 am

दिव्य मराठी एक्स्पोज:बाण, बांबू अन् ब्लेडने बाळंतपण; सुरक्षित मातृत्व वाऱ्यावर नंदुरबारमध्ये पुरुष दायांच्या भरवशावर आजही हाेताहेत प्रसूती

राज्यातील माता मृत्यू, अर्भक मृत्यू, नवजात मृत्यू कमी व्हावेत म्हणून महाराष्ट्र शासनाने गेल्या दीड वर्षात ७७१ कोटींचा निधी खर्च केला. मात्र दुर्गम भागात ना योजना पोहोचल्या ना शासनाची आरोग्य यंत्रणा. त्यामुळे आजही बांबूच्या काड्या, बाणाची पाती आणि दाढीच्या ब्लेडने प्रसूती केल्या जात असल्याचा हा धक्कादायक रिपोर्ट. कहर म्हणजे वेदना कमी करण्यासाठी येथे बाळंतिणीला मोहाची दारू पाजली जाते. यामध्ये किती बाळं दगावली जातात आणि किती मातांचे मृत्यू लपवले जातात याची नोंदच होत नसल्याचं भीषण वास्तव चिमलखेडेचे नुरजी वसावे यांनी मांडलं. ६ कोटी खर्च करून बांधलेल्या जांगठी पीएचसीपासून अवघ्या ७ किलोमीटरवरील ही परिस्थिती. धडगाव आणि अक्कलकुव्यामध्ये शेकडाे बाळंतपणं करणारे वाहाऱ्या अन‌् हिंद्या बाई अडली की पहाडातून लोकं येतात. आतापर्यंत हजारो बायकांची सुटका केली. एकदा बाळ पोटात गेलं होतं. त्याचे ब्लेडने तुकडे करून काढले. बाई अडली असेल तर तिच्या खाटेखाली गरम शेगडी ठेवतो, तिला गरम पाणी प्यायला देतो. मंत्र म्हणतो ब्लेड आणि नाळ खड्ड्यात पुरतो. माझ्या वडलांपासून हे काम आम्ही करतो. मी आतापर्यंत शेकडो बायकांची बाळंतपणं केली. आता माझा मुलगाही करतो. तेल लावून तिची वार पाडतो. वेदना थांबत नसतील तर थोडी मोहाची दारू पाजतो. बोटीत घालून गुजरातच्या दवाखान्यात नेतात.बोट नसते तेव्हा मलाच घेऊन जातात.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 6:53 am

मांजा वापरणाऱ्या मुलांच्या पालकांवर गुन्हा नाेंदवणार:पोलिस आयुक्तांचे मांजाविराेधात कठाेर पाऊल

नायलॉन व चायनीज मांजाने होणारे अपघात आणि जीवितहानी लक्षात घेता शहर पोलिसांनी कठोर पाऊल उचलले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी भा.ना.सु. संहितेच्या कलम १६३ अंतर्गत मांजावर पूर्णपणे बंदी घातली. नायलॉन मांजा बाळगणारे सज्ञान तसेच अल्पवयीन मुलांच्या पालकांवर थेट कलम ११० नुसार ‘सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न’ गुन्ह्याखाली कारवाई केली जाईल. दरम्यान, ४ डिसेंबर राेजी ३ वर्षांचा चिमुकला स्वरांशाचा गळा मांजामुळे चिरल्याप्रकरणी सिडकाे ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल झाला आहे. यापुढे असेच गुन्हे दाखल करू, असा आयुक्तांनी इशारा दिला आहे. नायलॉन किंवा चायनीज मांजामुळे लहान मुले, दुचाकीस्वार आणि पादचारी जखमी होतात किंवा त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय मांजा विद्युत तारेवर पडून शॉर्टसर्किट आणि आगीच्या घटनाही घडतात. अनेक वन्य पक्ष्यांचा जीव मांजामुळे जातो. त्यामुळे नागरिकांच्या आणि पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाइन मांजा विक्रीबंदीसाठी आज बैठक शहरात पतंग व मांजा विक्री दुकानदारांना पोलिसांनी सूचना केल्या आहेत. नायलॉन मांजा ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातूनही शहरात येतो. त्यावर बंदी आणण्यासाठी सोमवारी शहरातील सर्व कुरिअर चालकांची बैठक घेणार आहे. अशा पद्धतीचे पार्सल कोणी मागवले त्यांची नावे घेणार आहे, पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा दिला. वापरणाऱ्यांवर सक्त कारवाई नागरिकांनी जीवघेणा नायलॉन मांजा वापरू नये. या मांजामुळे कोणाचा जीव धोक्यात आल्यास संबंधित विक्रेता आणि वापरकर्त्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात येईल. जर वापरकर्ते अल्पवयीन मुले असल्यास त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. -प्रवीण पवार, पोलिस आयुक्त.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 6:37 am

अपघातात भावापाठोपाठ ‎जखमी बहिणीचाही मृत्यू‎:कन्नड तालुक्यातील करंजखेडा येथे अंत्यसंस्कार‎

आडगाव बुद्रुक गावाजवळ शनिवारी ‎‎रात्री दुचाकीला पिकअपने जोरदार‎धडक दिल्याने भावाचा मृत्यू झाला‎होता, तर बहीण गंभीर जखमी होती. ‎‎उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला ‎‎असून, दोघांवरही करंजखेडा येथे ‎‎एकाचवेळी रविवारी अंत्यसंस्कार ‎‎करण्यात आले.‎ दोघेही बहीण- भाऊ छत्रपती‎संभाजीनगर येथे नोकरीला होते.‎रविवारी सुटी असल्याने ते शनिवारी‎सायंकाळी गावाकडे दुचाकीवरून‎जात होते. गणेश संजय सुरडकर‎(३०) व निशा संजय सुरडकर (२५)‎अशी मृतांची नावे आहेत. निशा ही‎येथील निमाई‎हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत‎होती. गणेश एका खासगी कंपनीत‎नोकरी करत होता. रविवारी दोघांनाही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎सुटी होती. सायंकाळी सातच्या‎सुमारास ते दुचाकीने (एमएचक्यू‎३२६०) गावाकडे निघाले होते.‎आडगाव बुद्रुकजवळ समोरून‎आलेल्या पिकअपने धडक दिली.‎दोघेही रस्त्यावर पडले. महात्मा फुले‎क्रीडा रुग्णवाहिकेचे चालक विजय‎देवमाळी यांनी त्यांना रुग्णालयात‎दाखल केले होते. त्यांच्या पश्चात‎आई-वडील आणि एक विवाहित‎मोठी बहीण असा परिवार आहे.‎घटनेमुळे हळहळ व्यक्त झाली.‎

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 6:33 am

रोहयोच्या कामांसाठी मजुरांचा ‎एकच फोटो; 5 कोटी हडपले‎:फुलंब्रीत 7 रोजगार सेवकांची सेवा समाप्त; 11 जणांना नोटीस‎

फुलंब्री तालुक्यातील रोजगार हमी योजनेंतर्गत‎३३ गावांतील ९६ कामांसाठी चक्क मजुरांचे‎एकच सामूहिक छायाचित्र वापरल्याचा ‎‎धक्कादायक प्रकार समोर आला आहे.‎त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी ‎‎अधिकारी, प्रशासक अंकित यांनी ७ रोजगार ‎‎सेवकांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिले आहेत. ‎‎त्याचबरोबर २ सहायक कार्यक्रम अधिकारी,‎७ अभियंता आणि २ संगणक ऑपरेटर अशा‎११ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस‎बजावली आहे. या कामांमध्ये ५ कोटी १८ ‎‎लाखांची बिले उचलण्यात आली आहेत.‎तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मातोश्री‎पाणंद रस्ते योजनेच्या कामातील‎गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली‎आहे. फुलंब्री तालुक्यातील ३३ गावांतील ९६‎कामांसाठी मजुरांचा एकच सामूहिक फोटो,‎महिला मजुरांच्या जागेवर पुरुषांचे, तर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पुरुषांच्या जागेवर महिलांचे फोटो अपलोड‎करून ५ कोटी १८ लाख रुपयांची बिले‎उचलल्याचा प्रकार ६ व ७ जुलै रोजी‎उघडकीस आला होता. याची दखल घेऊन‎राज्याचे रोहयो आयुक्त, जिल्हाधिकारी आणि‎जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत‎चौकशीचे आदेश दिले.‎ प्रकरणाची दोन वेळा चौकशी‎जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी‎अंकित यांनी ७ जुलै रोजी यासाठी चौकशी‎समिती स्थापन केली हाेती. समितीने दिलेला‎पहिला अहवाल अपूर्ण असल्याने दुसऱ्यांदा‎चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.‎त्यानुसार दुसऱ्यांदा संबंधित समितीने अहवाल‎दिल्यानंतर सीईओ अंकित यांनी गटविकास‎अधिकाऱ्यांना संबंधित ग्रामपंचायतींमध्ये‎ग्रामसभा घेऊन ७ रोजगार सेवकांची सेवा‎समाप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.‎

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 6:32 am

विद्यार्थ्यांच्या तणावमुक्तीसाठी ‘शनिवार 1 तास पॉज’ उपक्रमातून दिसला बदल:कलाकुसरीचा आनंद; नो मोबाइल गेम, नाे रिल्स

खेळाचे साहित्य आहे, पण मूल त्यात रमत नाही. मैदानी खेळांची जागा मोबाइल गेम्स, रील्सने घेतली आहे. याचा परिणाम मुलांच्या बालपणावर होतोय. बालपण हरवू नये, मैदानी खेळांची माहिती होण्याबरोबरच तणावमुक्त जीवन जगता यावे यासाठी पायोनियर्स सेकंडरी शाळेसह बालविकास विद्यामंिदरमध्ये सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास “शनिवार एक तास पॉज’ उपक्रम सुरू केला आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतो आहे.आठवडाभर शाळेतील अभ्यास, गृहपाठ नंतर खासगी क्लास यात एका मशीनप्रमाणे विद्यार्थी जुंपले जात आहेत. वर्षभरापूर्वी मॅडमकडे काही तरी वेगळं शिकवा म्हणून विद्यार्थ्यांनी हट्ट केला. त्यातूनच तणाव मुक्तीसाठी एक दिवस एक तास पॉज हवा. म्हणून “शनिवार पॉज तास’ हा उपक्रम सुरु करण्यात आल्याचे शिक्षिका आशा मालटे यांनी सांगितले. यात शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आट्या पाट्या, धप्पा कुटी, लिंगोरचा, आंधळी कोशिंबर, आपडी थापडी असे खेळ शनिवारी रंगतात. यामुळे विद्यार्थ्यांचे मनोरंजन आणि तणावमुक्तीसाठी मदत होते. विद्यार्थ्यांचा स्वविकास अभ्यासक्रमात स्वविकास आणि विद्यार्थ्यांसोबत होत असलेल्या चर्चेतून तणावमुक्त कसे ठेवता येईल. यासाठी उपक्रम राबविला जातो. ज्यात जुने पारंपरिक खेळ विद्यार्थी खेळतात. यातूनही त्यांना अभ्यासातील गोष्टी शिकविल्या जातात. -आशा माल्टे, शिक्षिका शालेय विद्यार्थी खेळाने तणाव विसरले मी दहावीत आहे. बऱ्याच वेळा अभ्यासाचा ताण पडतो. भीती वाटते. या तणावातून मुक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना पॉज हवा. तो शनिवारच्या उपक्रमामुळे मिळतोय. ताण कमी होतो. आम्ही कधी शिवणकाम, विणकाम करतो, सारिपाट खेळतो. आमचे छंद या उपक्रमातील कलाकुसरीने जपतो. -संस्कृती शहरवाले, विद्यार्थिनी

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 6:29 am

प्रगतिशील शेतकरी:पारनेरमधील शेतकऱ्याने 8 एकरावर लावली 2500 चंदनाची झाडे, 15 वर्षांनी प्रति एकरी मिळेल कोट्यवधींचे उत्पन्न

चंदन शेती हा भारतातील शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी प्रयोग ठरत आहे. चोरीची अधिक भीती असल्याने या शेतीकडे बहुतांश शेतकरी वळत नाहीत. परंतु पारनेर तालुक्यातील गोरेगावचे शेतकरी अंबादास काकडे यांनी २०१६ मध्ये आठ एकर क्षेत्रावर चंदनाचा प्रयोग यशस्वी केला. विशेष म्हणजे चंदनाची झाडे चोरी जाऊ नयेत यासाठी होस्ट म्हणून घायपाताचे कुंपण त्याला करण्यात आले आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून चंदनाला संरक्षित करण्याचा हा उत्तम पर्याय मानला जात आहे. चंदन शेतीचा प्रयोग म्हणजे पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन दीर्घकालीन, उच्च उत्पन्न देणाऱ्या वनस्पतीची लागवड. चंदन हे स्वतंत्रपणे अन्न शोषण करत नाही, त्यासाठी 'होस्ट' झाडांची गरज असते. काकडे यांनी हा प्रयोग वैज्ञानिक पद्धतीने राबवला. प्रथम, आठ एकरावर सुमारे अडीच हजार चंदनाची रोपे लावली. दोन झाडांमधील अंतर १२ फूट आणि दोन ओळींमधील अंतर १० फूट ठेवले, ज्यामुळे झाडांची वाढ चांगली झाली. सुरुवातीला तूर आणि शेवगा यांसारखी लहान होस्ट दिली, तर दोन-तीन वर्षांनंतर कडूनिंब, बाभूळ, सीताफळ आणि जांभूळ यांसारखी कायमस्वरूपी होस्ट लावली. चंदनाला संरक्षणाची मोठी गरज असल्याने, काकडे यांनी कृत्रिम आणि नैसर्गिक संरक्षणाची व्यवस्था केली. प्रत्येक चंदनाच्या झाडाभोवती १० ते २० घायपाताची रोपे लावली. घायपात हे काटेरी वृक्ष असल्याने चोरांना झाडापर्यंत पोहोचणे कठीण होते – प्रथम घायपात काढण्यासाठी १०-१५ मिनिटे लागतात. यामुळे दुहेरी फायदा झाला. होस्ट मिळाला आणि सुरक्षा वाढली. हा प्रयोग राबवताना काकडे यांनी पारंपरिक पद्धतींचा अवलंब केला. एका एकरात ४०० ते ५०० झाडे पहिल्या चार-पाच वर्षांत शेणखत आणि हिरवळीचे खत भरपूर दिले, ज्यामुळे झाडांची वाढ वेगवान झाली. चंदनाला १० वर्षांनंतर गाभा तयार होतो आणि १५ वर्षांनंतर परिपक्व होतो. एका झाडापासून १०-१५ किलो गाभा मिळतो, ज्याचा २०२५ मधील दर १० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. यामुळे एका झाडापासून १ ते १.५ लाख रुपये उत्पन्न मिळते. एका एकरात ४०० ते ५०० झाडे लावता येतात, ज्यामुळे १५ वर्षांनंतर एकरी ४ कोटी रुपयांपर्यंत कमाई शक्य असल्याचे या क्षेत्रातील तज्ञ सांगतात. मध्यम जमिनीतही चंदन लागवड यशस्वी पूर्वी चंदनाची लागवड फक्त जंगलात नैसर्गिकरित्या होत असे आणि तस्करीमुळे हा दुर्मीळ वृक्ष बनला होता. मात्र, २०१५ मध्ये भारत सरकारने आणि २०१६ मध्ये महाराष्ट्र शासनाने चंदन शेतीला परवानगी दिली. यामुळे शेतकरी या मौल्यवान वनस्पतीकडे वळू लागले. महाराष्ट्रात चंदन शेतीला प्रति एकर २० हजार रुपयांचे अनुदान मिळते, मात्र फक्त १०-१५ शेतकऱ्यांनी ते घेतले आहे. काकडे यांच्या प्रयोगाने दाखवले की, मध्यम जमिनीतही चंदन यशस्वी होऊ शकते. शेतकरी मोबाईल नंबर - अंबादास काकडे, गोरेगाव (पारनेर) - 9822274727

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 5:00 am

‘इंडिगो’चा हवाई गोंधळ !

देशातील सर्वांत मोठी विमान कंपनी ‘इंडिगो’ला सध्या परिचालन (ऑपरेशन्स) संकटाचा सामना करावा लागत आहे. गत चार दिवसांत पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबादसह देशातील प्रमुख विमानतळांवरून सुमारे १००० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले. असे होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) नवीन ‘फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन’(एफडीटीएल) नियम. या […] The post ‘इंडिगो’चा हवाई गोंधळ ! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 12:49 am

१२३ कोल्हापुरी बंधा-यांतून गेटअभावी पाण्याचा विसर्ग

लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हयात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतक-यांच रब्बी हंगामाची चिंता मिटली आहे. पावसाळा संपून दिड-दोन महिने होत आहेत. पाण्याचा प्रवाह कमी होत असल्याने जिल्हयातील २९५ पैकी १२३ कोल्हापूरी बंधा-यातून वाहते पाणी साठवून ठेवण्यासाठी गेट बसवणे आवश्यक आहे. त्यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे ८२ लाख ३१ हजार […] The post १२३ कोल्हापुरी बंधा-यांतून गेटअभावी पाण्याचा विसर्ग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 12:46 am

शेतक-यांचे गोठा, विहीर, कुशलचे बिल रखडले

जळकोट : प्रतिनिधी युपीए सरकारच्या काळामध्ये नरेगा (राष्ट्रीय रोजगार हमी योजना) सुरू झाली. यानंतर मागेल त्या मजुरास काम मिळू लागले. त्यामुळे याचा फायदा मजुरांना झाला परंतु रोजगार हमी योजनेकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर काम केलेल्या मजुरांना पैसे देण्यासाठी सरकारजवळ निधी उपलब्ध नाही, अशी ओरड आता सुरू झाली आहे. […] The post शेतक-यांचे गोठा, विहीर, कुशलचे बिल रखडले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 12:45 am

रेल्वे मार्गाचा प्रश्न अधिवेशनात मांडावा

जळकोट : प्रतिनिधी लातूर रोड जळकोट बोधन हा रेल्वेमार्ग सन २०१६ यावर्षी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूर केला होता. या रेल्वे मार्गास मंजूर होऊन तब्बल दहा वर्षे झाले आहेत, असे असले तरीही या रेल्वेमार्गाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होऊ शकली नाही. उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे […] The post रेल्वे मार्गाचा प्रश्न अधिवेशनात मांडावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 12:44 am

गौरव खन्ना बिग बॉस १९ चा विजेता

मुंबई : प्रतिनिधी सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बिग बॉस शोच्या १९ व्या पर्वाचा विजेता गौरव खन्ना ठरला आहे तर फरहाना भट्ट हा उपविजेता ठरला. मराठमोळा प्रणीत मोरे हा तिस-या क्रमांकावर राहिला. गौरव खन्नाने ५० लाखांच्या बक्षिसासह बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर केली. बिग बॉस १९ शो सलमान खानने होस्ट केला होता. चाहत्यांनी बिग बॉस १९ […] The post गौरव खन्ना बिग बॉस १९ चा विजेता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 12:44 am

पूरग्रस्त शेतक-यांना उर्वरित मदत मिळणार

मिलिंद साठे राज्याचे नवे महाधिवक्ता नागपूर : प्रतिनिधी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रासाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतक-यांचे मोठे नुकसान झाले, त्यांना मोठी मदत मिळणार आहे. पूरग्रस्त शेतक-यांसाठी उर्वरित रक्कम देण्याबाबतच्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली. यामुळे १० लाख ६७ शेतक-यांना मोठा दिलासा […] The post पूरग्रस्त शेतक-यांना उर्वरित मदत मिळणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 12:37 am

तीन कवितासंग्रहांना अक्षर क्रांती पुरस्कार जाहीर:अमरावतीच्या 'फुलकई'सह 27 डिसेंबरला नागपुरात वितरण

अक्षर क्रांती फाऊंडेशनने जाहीर केलेल्या प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांमध्ये यावर्षी तीन कवितासंग्रहांना सन्मानित करण्यात आले आहे. यात अमरावतीच्या डॉ. मंदा नांदुरकर यांच्या 'फुलकई' या बालकवितासंग्रहाचा समावेश आहे. या पुरस्कारांचे वितरण २७ डिसेंबर रोजी नागपूर येथील रेशीमबाग येथे आयोजित अक्षरक्रांती जिल्हा साहित्य महोत्सवात केले जाईल. डॉ. मंदा नांदुरकर यांच्या 'फुलकई' या बालकवितासंग्रहासह अकोल्याचे कवी दिनेश गावंडे यांच्या 'लख्ख कंदीलाच्या उजेडात' आणि नाशिकचे कवी किरण भावसार (सिन्नर) यांच्या 'घामाचे संदर्भ' या कवितासंग्रहांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अक्षरक्रांती साहित्य पुरस्कार दरवर्षी दर्जेदार कवितासंग्रहांना दिला जातो. कोरोनामुळे वितरण थांबल्याने, जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२४ पर्यंत प्रकाशित झालेले सुमारे २५० कवितासंग्रह या पुरस्कारासाठी मागवण्यात आले होते. त्यातून या तीन कवितासंग्रहांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र शासन अनुदानित दोन दिवसीय 'अक्षरक्रांती जिल्हा साहित्य महोत्सवा'चा भाग आहे. हा महोत्सव महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग, नागपूर येथील सभागृहात सकाळी १० वाजता सुरू होईल. अक्षरक्रांती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शंकर घोरसे आणि कला गौरव संस्थेच्या अध्यक्ष डॉ. संगीता बानाईत यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ साहित्यिक वसंत वाहोकर महोत्सवाचे अध्यक्ष असतील, तर वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. विदर्भ साहित्य संघांचे अध्यक्ष प्रदीप दाते यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य पत्रकार श्रीपाद अपराजित, माजी संमेलनाध्यक्ष सुरेश पाचकवडे आणि जपानमधील प्रसिद्ध कादंबरीकार उर्मिला देवेन टोकियो उपस्थित राहणार आहेत. समारोपीय सत्राचे अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य मंडळाचे सदस्य डॉ. गजानन नारे असतील. तसेच, डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. तीर्थराज कापगते, अशोक मानकर आणि अबुधाबी येथील प्रसिद्ध कवी मनोज भारशंकर यांचीही प्रमुख उपस्थिती असेल. अक्षरक्रांती फाऊंडेशनतर्फे सध्या केवळ उत्कृष्ट कवितासंग्रहांना पुरस्कार दिला जातो. परंतु, पुढील वर्षापासून कविता संग्रहांसोबतच इतर साहित्य प्रकारांनाही पुरस्कार योजनेत समाविष्ट करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे आयोजकांनी कळवले आहे. सध्या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ असे आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 11:00 pm

मुंबई मेट्रोचा खोळंबा:तांत्रिक बिघाडामुळे मार्गिका 2 अ आणि 7 ची सेवा विस्कळीत, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

रविवारी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांना संध्याकाळी मनस्तापाला सामोरे जावे लागले. तांत्रिक बिघाड उद्भवल्याने मुंबई मेट्रोच्या मार्गिका 2 अ आणि 7 वरील सेवा डीएन नगर ते गुंदवली स्थानकादरम्यान विस्कळीत झाली. गेल्या दीड तासांपासून मेट्रो सेवा ठप्प असल्याने स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. रविवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो सेवा कोलमडल्याने प्रवाशांचे हाल झाले. या संदर्भात मुंबई मेट्रो प्रशासनाने सोशल मीडियाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाने म्हटले आहे की, काही तात्पुरत्या तांत्रिक अडचणीमुळे मेट्रो मार्गिका 2 अ आणि 7 वरील सेवांमध्ये विलंब होत आहे. प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मेट्रो सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आमची टीम युद्धपातळीवर कार्यरत आहे. मेट्रो प्रशासनाने हा तांत्रिक बिघाड लहान स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट केले असले, तरी प्रवाशांना मात्र वेगळाच अनुभव आला. जर बिघाड किरकोळ असता, तर तब्बल दीड तास सेवा खंडित राहिली नसती, असा सूर प्रवाशांमधून उमटत आहे. सुट्टीच्या दिवशी सहकुटुंब बाहेर पडलेल्या नागरिकांना आणि चाकरमान्यांना या अनपेक्षित गोंधळाचा मोठा फटका बसला आहे. सेवा पूर्ववत करण्यासाठी तांत्रिक पथक प्रयत्न करत असले तरी स्थानकावरील गर्दीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 9:59 pm

विरोधी पक्षनेते पद नाकारणारे महायुती सरकार संविधानविरोधी

नागपूर : प्रतिनिधी राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद नाकारणारे सरकार लोकशाहीविरोधी आहे. इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहे विरोधी पक्षनेत्यांविना आहेत. विरोधकांचा आवाज दाबून सरकारला आपले पाप लपवता येणार नाही. शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी साठी दिलेली तुटपुंजी मदत यावर सरकारला जाब द्यावाच लागेल असे ठणकावत विरोधी पक्षाने आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला. सोमवारपासून विधीमंडळाचे […] The post विरोधी पक्षनेते पद नाकारणारे महायुती सरकार संविधानविरोधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 9:16 pm

शिरजगाव मोझरीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, श्वानांच्या पिलांची शिकार:भीतीमुळे शेतीची कामे ठप्प, वनविभागाकडून ड्रोनद्वारे शोध सुरू

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी गावात बिबट्याच्या हल्ल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोळवण परिसरातील राजेंद्र कडू यांच्या शेतात बिबट्याने कुत्र्याच्या पिलांची शिकार केली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतीची कामे ठप्प झाली आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, गेल्या आठ दिवसांपासून शिरजगाव मोझरी गावाच्या सभोवताल बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्याच्या या वावरामुळे रब्बी पिकांची पेरणी, कापसाचा वेचा आणि पिकांचे ओलीत थांबले आहे, ज्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आज सकाळी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान या भागात बिबट्याचे ठसे आढळून आले. त्यानंतर काही तरुणांच्या आग्रहाखातर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ड्रोनच्या मदतीने बिबट्याचा शोध सुरू केला. यावेळी वनपाल खेडकर, वनरक्षक जांभे व गवई, वनमजूर गजानन राऊत यांच्यासह स्थानिक शेतकरी व गावकरी उपस्थित होते. रविवार दुपारी १२ वाजताच्या सुमारास कोळवण परिसर, शिवणगाव परिसर, वऱ्हा पाणंद रस्ता परिसर आणि गावाच्या सभोवताल बिबट्याची पाहणी करण्यात आली. मात्र, बिबट कोठेही आढळून आला नाही, त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वनविभागाच्या अंदाजानुसार, बिबट्या धोत्रा, सालोरा शिवारात गेल्याची शक्यता आहे. या घटनेनंतर प्रशांत कांबळे यांनी चांदूर रेल्वे वनविभागाच्या आरएफओ शीतल धुते यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी धोत्रा, सालोरा शिवारात तातडीने शोधमोहीम राबवण्याची मागणी केली. त्यानंतर दुपारी ३ वाजताच वनकर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पाहणी करण्याचे आदेश वनाधिकाऱ्यांनी दिले. बिबट्याच्या वावराची मालिका ३० नोव्हेंबर रोजी रात्री कोळवण परिसरात किसनराव हटवार यांच्या मुलीला बिबट्या दिसल्यापासून सुरू झाली. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी सकाळी रमेश हिवराळे यांना वऱ्हा पाणंद रस्त्यावरील नदीवर बिबट दिसला. आज सकाळी अविनाश लंगडे आणि मधुकरराव ढोबळे यांनाही शिवणगाव शिवारात बिबट दिसल्यानंतर श्वानांच्या पिलांची शिकार उघड झाली.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 9:13 pm

पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागाचा अमृत महोत्सव सोहळा संपन्न:माजी विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांची उपस्थिती; विविध उपक्रमांचे आयोजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागाचा अमृत महोत्सव सोहळा ७ डिसेंबर २०२५ रोजी भूशास्त्र विभागाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या सोहळ्याला देशभरातून सुमारे ३५० आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात चहापान आणि 'अमृत महोत्सवी वर्ष' बिल्ला वितरणाने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठ गीत आणि महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ झाला. महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागाचे माजी सचिव आणि भूगोल विभागाचे १९६५-१९६७ बॅचचे विद्यार्थी शिवाजीराव देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले, तर प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. अमित धोर्डे यांनी स्वागतपर भाषण करताना विभागात कार्यरत राहिलेल्या दिवंगत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. कुलगुरूंच्या हस्ते विभागाच्या समृद्ध परंपरेत योगदान देणाऱ्या २० माजी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अमृत महोत्सवाचा लोगो, या वर्षात होणाऱ्या परिषदेची पुस्तिका आणि प्रा. सुधाकर परदेशी यांच्या भूस्खलनावरील पुस्तकाचे प्रकाशनही झाले. या सोहळ्यात आयआयटी मुंबईचे मोहम्मद कासिम खान, जे FOSSEE GIS (MoS) चे राष्ट्रीय समन्वयक आहेत, यांनी भूगोल विभागासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागाची 'ओपन-सोर्स जिओस्पेशियल नॉलेज पार्टनर' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार, भूस्थानिक शिक्षण, संशोधन आणि जनसंपर्क उपक्रमांच्या समन्वयासाठी विभाग प्रमुख नोडल युनिट म्हणून कार्य करेल. फोसी GIS प्रकल्पातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे विद्यापीठाला 'सर्वोत्तम विद्यापीठ पुरस्कार' देखील प्रदान करण्यात आला. या घोषणेमुळे उपस्थितांमध्ये आनंद व अभिमानाची भावना व्यक्त झाली. प्रमुख पाहुणे शिवाजीराव देशमुख यांनी भूगोल विभागाच्या ७५ वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरवपूर्ण आढावा घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी विभागाच्या विकासासंदर्भात आपले विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. डॉ. गोसावी यांनी विभागासोबतचे आपले अनुभव कथन केले. दुपारचे सत्र डॉ. सपना ससाणे यांच्या सूत्रसंचालनाखाली सुरू झाले. प्रा. अमित धोर्डे यांनी विभागातील विद्यमान शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ओळख करून दिली. प्रा. रवींद्र जायभाय यांनी डिजिटल सादरीकरणाद्वारे विभागाच्या ७५ वर्षांच्या आठवणी प्रभावीपणे मांडल्या. प्रा. सुधाकर परदेशी यांनी जिओइन्फॉर्मेटिक्स शाखेची प्रगती आणि विभागातील साधनसंपत्तीची माहिती दिली.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 9:12 pm

पुणे मनपा निवडणूक मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात:भाजप तयार करणार वचननामा, पुणेकरांशी साधणार संवाद

आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) वचननामा तयार करणार आहे. यासाठी पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पुणेकरांशी संवाद साधतील आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेतील, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी दिली. यावेळी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली की, ही निवडणूक मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात लढवली जाईल. महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, रविवारी मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहर कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, ज्येष्ठ नेते दिलीप कांबळे, खासदार मेधा कुलकर्णी, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, आमदार भिमराव तापकीर, आमदार सुनिल कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार योगेश टिळेकर आणि श्रीनाथ भिमाले यांच्यासह विस्तारित कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. मोहोळ यांनी सांगितले की, ही बैठक महापालिका निवडणुकांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून घेण्यात आली. भाजपची यंत्रणा वर्षभर कार्यरत असते, परंतु निवडणुकीच्या दृष्टीने शहर पातळीवर पुढील नियोजन या बैठकीत करण्यात आले. पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या लक्षात घेता इच्छुकांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून दोन दिवस शहर कार्यालयात अर्ज मागवले जातील. हे अर्ज प्रदेश कार्यालयाकडे पाठवले जातील आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार कोअर कमिटी पुढील निर्णय घेईल. भाजपचा वचननामा तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात कार्यकर्ते घरोघरी जाऊन पुणेकरांशी चर्चा करतील. पुढील २५-५० वर्षांतील पुण्याचे भवितव्य आणि विकासाबाबत पुणेकरांच्या अपेक्षा जाणून घेतल्या जातील. यात सर्वसामान्यांच्या अपेक्षांबरोबरच विविध विषयातील तज्ज्ञांशीही संवाद साधून त्यांचे मत विचारात घेतले जाईल. या माहितीवर आधारित वचननामा तयार केला जाईल आणि पुढील पाच वर्षांत त्याची १०० टक्के अंमलबजावणी केली जाईल, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले. याशिवाय, शहराध्यक्षांच्या स्तरावर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह प्रत्येक प्रभागात संघटनात्मक बैठका घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या जातील. महायुतीबाबत बोलताना मोहोळ म्हणाले की, आम्ही महायुतीचे घटक आहोत. 'युतीधर्म' पाळा, अशी भूमिका आमच्या नेत्यांनी मांडली आहे. स्थानिक परिस्थिती पाहून सामंजस्याने जिथे शक्य असेल तिथे महायुती म्हणून निवडणूक लढू. जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढाई होईल. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल, असे मोहोळ यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 9:02 pm

विश्व हिंदू परिषदेचे डॉ. आंबेडकरांना अभिवादन:हिंदू समाज एकत्र आल्याशिवाय भेदभाव नष्ट होणार नाही- आलोक कुमार

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या शतकातील महानतम व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य अपमान, अन्याय आणि सामाजिक विषमतेशी लढताना गेले. शाळेत, नोकरीत आणि समाजात सर्वत्र त्यांना भेदभावाचा सामना करावा लागला. या वेदनादायी अनुभवातून त्यांनी समतेचा, स्वाभिमानाचा आणि न्यायाचा मार्ग समाजासमोर ठेवणारे भारतीय संविधान दिले. मात्र संपूर्ण हिंदू समाज एकत्र आला नाही, तोपर्यंत भेदभाव पूर्णपणे नष्ट होऊ शकणार नाही,” असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्व हिंदू परिषद – पूर्व विभाग पुणे यांच्या वतीने कॅम्प येथील अरोरा टॉवर्स परिसरातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास विश्व हिंदू परिषदेचे धार्मिक विभागाचे संजय मुद्राळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, तसेच प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत उपस्थित होते. आलोक कुमार म्हणाले, “आजही शिक्षण, नोकरी, आरोग्य आणि संधी यामध्ये अनुसूचित समाजाला समान हक्क पूर्णपणे मिळालेला नाही. त्या संधी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत न्यायाने पोहोचेपर्यंत बाबासाहेबांची लढाई अपूर्णच राहील. ती लढाई पूर्ण करण्याची जबाबदारी आपली सामूहिक आहे.” कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन करून सामाजिक समता आणि एकात्मतेच्या दिशेने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. समारोप बुद्ध वंदना घेऊन करण्यात आला आणि वातावरण करुणा, शांती व समानतेच्या संदेशाने भारावून गेले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:51 pm

सप्तश्रृंगी गडावर भीषण अपघात:दर्शन घेऊन परतताना कार दरीत कोसळली, 5 भाविकांचा मृत्यू

नाशिकमधून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. सप्तश्रृंगी गडावरील गणपती पॉईंटजवळ एक इनोव्हा कार थेट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात कारमधील 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे भाविक गडावर देवीचे दर्शन घेऊन आनंदाने घराकडे परतत होते. मात्र, घाटातून उतरत असताना गणपती पॉईंटजवळ ही दुर्घटना घडली. कारचा वेग किंवा तांत्रिक बिघाडामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नियंत्रण सुटलेली ही कार रस्त्यालगतचा संरक्षक कठडा तोडून थेट हजारो फूट खोल दरीत कोसळली. दरी अत्यंत खोल असल्याने आणि गाडी वेगाने खाली आदळल्याने हा अपघात भीषण स्वरूपाचा ठरला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र, गाडी ज्या ठिकाणी पडली आहे, ती दरी अत्यंत खोल आणि दुर्गम असल्याने मदतकार्य पोहोचवण्यात आणि मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक तपासात आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, घाटातील अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:49 pm

आतापर्यंत ६१० कोटी रिफंड, ३००० बॅग परत केल्या

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेली आपली विमान सेवा जलद गतीने पूर्वपदावर आणण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आज त्यांनी १६५० हून अधिक यशस्वी उड्डाणे केले आहेत. ही संख्या काल १५०० वर होती. महत्वाचे म्हणजे, वेळेवर उड्डाण होण्याचे प्रमाण ३०% वरून ७५% वर पोहोचले आहे. […] The post आतापर्यंत ६१० कोटी रिफंड, ३००० बॅग परत केल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 8:43 pm

राज्य चेअरमनपदी डॉ. रमेश भराटे यांची बिनविरोध निवड

लातूर : प्रतिनिधी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्यची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सोलापूर येथे पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून डॉ. संतोष कुलकर्णी यांची घोषणा करण्यात आली तर सचिव म्हणून डॉ. विक्रांत देसाई यांची निवड करण्यात आली. याच बैठकीत लातूर येथील प्रसिद्ध श्वसन विकार व छाती विकार तज्ज्ञ डॉ. रमेश भराटे यांची असोसिएशन ऑफ […] The post राज्य चेअरमनपदी डॉ. रमेश भराटे यांची बिनविरोध निवड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 8:29 pm

दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत योजनांचा लाभ घ्यावा

लातूर : प्रतिनिधी शहरातील विविध घटकांसाठी केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रात राबवले जात आहे. यातील विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी केले आहे. मनपा अंतर्गत शहरात उपायुक्त वसुधा फड यांच्या मार्गदर्शनात या अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत १५६० बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. […] The post दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत योजनांचा लाभ घ्यावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 8:28 pm

पुण्यात प्रेमसंबंधातील वादातून युवकाचा खून:चंदननगरमध्ये पाच आरोपींना अटक, अल्पवयीन ताब्यात

पुण्यातील चंदननगर परिसरात शनिवारी सायंकाळी झालेल्या एका युवकाच्या खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. प्रेमसंबंधातील वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. लखन बाळू सकट (वय १८, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी प्रथमेश शंकर दारकू (वय २०), यश रवींद्र गायकवाड (वय १९), जानकीराम परशुराम वाघमारे (वय १८), महादेव पांडुरंग गंगासागरे (वय १९) आणि बालाजी आनंद पेदापुरे (वय १९, सर्व रा. बोराटे वस्ती, चंदननगर) यांना अटक करण्यात आली आहे. लखनचे काका केशव बबन वाघमारे (वय ३२) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधावरून लखन सकट आणि आरोपी यश गायकवाड यांच्यात वाद सुरू होता. शनिवारी (६ नोव्हेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास आरोपी यशने लखनला चंदननगरमधील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क परिसरात बोलावले. लखन आपल्या मित्रासोबत तिथे पोहोचला असता, यश गायकवाडने त्याला ‘मुलीशी तुझा संबंध काय आहे? तू का मध्ये पडतोस?’ अशी विचारणा केली. यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर यश आणि त्याच्या साथीदारांनी लखनला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीदरम्यान लखनवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या लखनला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या पाच आरोपींसह अल्पवयीन मुलाला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. या खून प्रकरणात पसार असलेल्या आणखी दोन ते तीन जणांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:07 pm

माझा घातपात करण्याचा कट, आरोपींनी धनंजय मुंडेंचे नाव घेतले:मनोज जरांगेंचा दावा; कुणबी नोंदी असूनही दाखले मिळत नसल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा

मी चांगले काम करत असल्याने माझ्यावर जळणारे लोक माझा घातपात करण्याच्या तयारीत आहेत. माझ्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पकडलेल्या तीन आरोपींनी जबाबात धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे. असे असतानाही जालन्याच्या पोलिस अधीक्षकांनी धनंजय मुंडे यांना अटक करण्यासाठी गृहमंत्र्यांकडे परवानगी का मागितली नाही? असा सवाल उपस्थित करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा प्रशासनावर आणि सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, नोंदी सापडूनही प्रमाणपत्रे दिली जात नसल्यास पुन्हा आंदोलनाचा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक मनोहर वाडेकर यांना मातृशोक झाल्याने, त्यांचे सांत्वन करण्यासाठी जरांगे पाटील पुण्याच्या चाकणमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे गंभीर आरोप केले. आरोपींची आणि आमची नार्को टेस्ट करा आपल्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दल बोलताना जरांगे म्हणाले, मी सरकारचे पोलिस संरक्षण नाकारले आहे. माझ्यासोबत दिसणाऱ्या पोलिसाला चालताना धाप लागते. मात्र, मला संपवण्याचा कट रचला जात आहे. पकडलेल्या आरोपींनी कबुली दिली नसती, तर गोष्ट वेगळी होती. पण त्यांनी नाव घेतले आहे. नार्को टेस्टची मागणी करणारे आता कुठे गेले? त्यांनी पुढे येऊन आरोपींची आणि आमची नार्को टेस्ट करावी. या प्रकरणाचे पुढच्या काळात वाईट पडसाद उमटतील, असा इशाराही त्यांनी दिला. नोंदी असूनही अडवणूक पुन्हा आंदोलनाचा पवित्रा मराठा आरक्षणाबाबत बोलताना जरांगे यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. दोनशे वर्षांपूर्वीच्या नोंदी असूनही अधिकारी जाणूनबुजून मराठा बांधवांना प्रमाणपत्र देत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यामुळे आम्ही शांत आहोत, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा विचार करावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी एकही प्रमाणपत्र थांबणार नाही आणि शिंदे समिती सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, त्याची आम्ही वाट पाहत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पनवेलमध्ये उभारलेल्या मराठा भवन उपक्रमाचे कौतुक करत राज्यभर असे उपक्रम राबवण्याची गरज व्यक्त केली. अधिवेशनावर आणि सत्ताधाऱ्यांवर टीका सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावरही जरांगे यांनी सडकून टीका केली. अधिवेशनात दोन दिवस त्यांच्यातील लफडे आणि गोंधळातच जातील. हे सगळे मिळून शेतकऱ्यांचे वाटोळे करणार आहेत. कर्जमाफी करायची असेल तर नुसत्या गप्पा नकोत, थेट आदेश द्या. हे सत्ताधारी आणि विरोधक सगळेच 'चाभरे' आहेत, अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला. हैदराबाद गॅझेट मिळून तीन महिने झाले तरी समिती स्थापन झाली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली, मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शब्दावर अजूनही विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:03 pm

सप्तश्रृंगी गडावरून परताना इनोव्हा दरीत कोसळून ५ ठार

नाशिक : सप्तशृंगगड येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला असून सप्तश्रृंग गडावरील घाट रस्त्यावरुन इनोव्हा कार (एम.एच.१५ बी.एन. ०५५५) खाली कोसळली आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. इनोव्हा कारमध्ये पिंपळगाव चिंचखेड येथील दोन महिला तीन पुरुष भाविक होते. सप्तशृंगगड दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून सप्तशृंगी गडावरुन इनोव्हा कार […] The post सप्तश्रृंगी गडावरून परताना इनोव्हा दरीत कोसळून ५ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 8:01 pm

राज्यात ओढाताणीची स्थिती मात्र दिवाळखोरी नाही

नागपूर : उपराजधानी नागपूर येथे सोमवारपासून सुरू होणा-या राज्य विधिमंडळाच्या सात दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांच्या भूमिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर […] The post राज्यात ओढाताणीची स्थिती मात्र दिवाळखोरी नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 7:52 pm

सायबर चोरट्यांकडून बँक खातेदारांची 38 लाखांची फसवणूक:विविध घटनांमध्ये ऑनलाईन गोपनीय माहितीचा गैरवापर करून पैसे लंपास

पुण्यात सायबर चोरट्यांनी बँक खातेदार आणि गुंतवणूकदारांना लक्ष्य करत मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. विविध घटनांमध्ये एकूण ३८ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये बँक खात्यातून पैसे लंपास करणे आणि शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून गंडा घालणे अशा प्रकारांचा समावेश आहे. सायबर चोरट्यांनी बँक खात्याला जोडलेले मोबाईल क्रमांक 'हॅक' करून गोपनीय माहिती मिळवली. या माहितीचा गैरवापर करत त्यांनी खातेदारांच्या खात्यातून ३८ लाख ५० हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी कोंढवा आणि मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोंढवा पोलीस ठाण्यात एका ५५ वर्षीय तक्रारदाराने फिर्याद दिली आहे. त्यांच्या बँक खात्यातून २९ लाख ९८ हजार ९७७ रुपये चोरट्यांनी लांबवले. खात्यातून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशाच प्रकारे मुंढवा भागातील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी ८ लाख ५० हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक पुढील तपास करत आहेत. दरम्यान, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषानेही सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीची फसवणूक केली आहे. त्यांना ५ लाख ६८ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तवाडी भागात राहणाऱ्या ४८ वर्षीय तक्रारदाराला सायबर चोरट्यांनी मोबाईलवर शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवणारे संदेश पाठवले होते. चांगला परतावा मिळेल असे सांगून त्यांना जाळ्यात ओढले. सुरुवातीला चोरट्यांनी परतावा देऊन विश्वास संपादन केला, मात्र नंतर तक्रारदाराने गुंतवलेली रक्कम आणि परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 7:39 pm

मी चांगले काम करत असल्याने माझ्या घातपाताचा कट

चाकण : माझ्याविरोधात घात करण्याचा कट रचला गेला आहे. याबाबत काही माहिती आमच्याकडे आहे. मी सरकारकडून दिलेली सुरक्षा नाकारली आहे. माझे रक्षण माझा समाज करील. घातपात प्रकरणाच्या चौकशीत गंभीर आरोप समोर आल्याचा धक्कादायक खुलासा जरांगे यांनी केला. हा घातपात माजी मंत्री धनंजय मुंडेंनी करण्यास सांगितला असल्याचे त्यांनी म्हटले. मग जालना जिल्ह्याच्या एसपीने गृहमंत्रालयाकडून त्यांच्या अटकेची […] The post मी चांगले काम करत असल्याने माझ्या घातपाताचा कट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 7:35 pm

विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याची परंपरा पाळली:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला, भास्कर जाधवांसह वडेट्टीवारांचाही घेतला समाचार

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विरोधी पक्षांनी या चहापानच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाने परंपरा पाळत बहिष्कार टाकला असे म्हणत खोचक टोला लगावला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने चहापानाचा कार्यक्रम होता आणि विरोधी पक्षाने परंपरा पाळत बहिष्कार टाकला, त्यामुळे आम्हाला आमचा चहा प्यावा लागला. आज विरोधी पक्षाची जी काही पत्रकार परिषद झाली ती अतिशय निराशाजनक आणि त्रागा करणारी होती. खरे म्हणजे त्या पत्रकार परिषदेत अनेक गमती झाल्या. भास्कर जाधव यांनी विजय वडेट्टीवार यांच्या मइकची बॅटरी बंद केली. भास्कर जाधव यांना अजून एक उपरती झाली की कॉंग्रेस इमानदार होती, सुसंस्कृत होती. होतीच म्हणाले ते आहे असे नाही म्हणाले, त्यामुळे त्यांना वस्तुस्थिती माहित आहे. तसेच शरद पवार गटाची त्यांच्या पत्रकावर नाहीये. महाराष्ट्र दिवाळखोर नाही पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, विजय वडेट्टीवार एकदम जोरात होते त्यांनी विदर्भावर भाष्य केले. मला त्यांना सांगायचे आहे की 2014 पूर्वीचा आणि त्यानंतरचा विदर्भ त्यांनी बघावा. त्यांच्या ब्रह्मपुरीच्या बाजूलाच गडचिरोली जिल्हा सुरू होतो. आताच गडचिरोली जिल्हा आणि पूर्वीचा जिल्हा जर त्यांनी बघितला तर त्यांनाही लक्षात येईल. एकूण आपण बघितले तर विरोधकांनी सरकारवर अनेक मुद्यांवरून टीका केली आहे. राज्य दिवाळखोर झाले असे दाखवण्याची घाई त्यांना झालेली आहे. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की, राज्याची आर्थिक परिस्थिती जरी ओढाताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरी कडे जात नाहीये. किंबहुना देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्वा निकषांमध्ये चढणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नावर आम्ही उत्तर देण्यास तयार शेतकऱ्यांच्याबाबतीत बोलायचे झाले तर 92 टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. 8 टक्के जे शेतकरी आहेत त्यांच्या केवायसीचा प्रश्न आम्ही सोडवत आहोत. त्यांना देखील आपण पैसे देणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत असे म्हणणे म्हणजे अभ्यास न करता केलेले विधान आहे. शेतकऱ्यांना आपण पूर्णपणे मदत दिलेली आहे. एकूणच या संपूर्ण अधिवेशनाच्या निमित्ताने या सर्व विषयांवर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नावर आम्ही उत्तर देण्यास तयार आहोत, असेही फडणवीस म्हणाले. विरोधकांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधी पक्ष नेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. खरे म्हणजे मुळातच मला असे वाटते की आत्ताचा विरोधी पक्ष हा दिशाहीन आहे. मुद्दे सुद्धा नाहीत आणि मुद्दे रेटण्यासाठी सुद्धा त्यांची इच्छा शक्ती देखील विरोधी पक्षात दिसत नाही. नागपूरच्या अधिवेशनात शेवटी आम्ही जे कामकाज करतो ते दुप्पट होते. त्यामुळे कामकाजाचे तास कुठेही कमी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 18 विधेयक या अधिवेशनात मांडणार या पत्रकार परिषदेत अजित पवार उपस्थित नव्हते यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार बहरीनवरून आत्ताच ते इकडे लँड झाले असल्याने ते इथे येऊ शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच 18 विधेयक आम्ही या अधिवेशनात मांडणार आहोत आणि या विधेयकांवर चर्चा करून ही विधेयक मंजूर व्हावीत असा आमचा प्रयत्न असणार आहे, असे फडणवीस म्हणाले. पायऱ्यांवर स्टंट मारण्यातच विरोधकांना धन्यता वाटते- एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी अतिशय विस्तृतपणे आपल्यासमोर चर्चा केली आहे. महायुती सरकारचे साडे तीन वर्ष होत आहेत. दुसऱ्या इनिंगचे हे दुसरे अधिवेशन आहे. कालावधी कमी असला तरी विदर्भच्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. विरोधकांनी विदर्भावर चर्चा घडवली पाहिजे. चहापानाच्या कार्यक्रमावर तर त्यांनी बहिष्कार टाकलाच आहे. पहिल्या इंनिंगमध्ये विरोधक फार जोरात होते. सभागृहात कमी आणि बाहेर जास्त बोलत होते. आमची एवढीच भूमिका आहे की हे अधिवेशन जनतेच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी असते, विरोधकांना यात फारसे स्वारस्य राहिले नाही. पायऱ्यांवर स्टंट मारण्यातच त्यांना धन्यता वाटते. आताचा विरोधी पक्ष अतिशय निष्प्रभ दिसत आहे. त्यांची अवस्था जी आपण पाहत आहोत, त्यांचे नेते सगळे घरात आणि कार्यकर्ते वाऱ्यावर होते. संख्याबळ वाढवा आणि विरोधी पक्ष नेता मिळवा पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधी पक्ष या अधिवेशनात किती विदर्भचे प्रश्न उपस्थित करतो माहित नाही. पण सरकार सगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार आहे. जरी विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी आम्ही त्यांना गांभीर्यानेच घेऊ. त्यांचा एकच मुद्दा सुरू आहे की विरोधी पक्ष नेता का दिला नाही? लोकांनीच त्यांना झिडकारले आहे, त्यांची संख्याबळ कमी आहे. त्यामुळे संख्याबळ वाढवा आणि विरोधी पक्ष नेता मिळवा. अडीच वर्षात जे महायुतीने काम केले त्याची फलश्रुती विधानसभेच्या निवडणुकीत मिळाले आहे. आम्ही एक टीम म्हणून काम करत आहोत. विरोधी पक्षाकडून आमची एकच अपेक्षा आहे की त्यांनी लोकांचे प्रश्न मांडावे. लोकांचे प्रश्न राहिले बाजूला, विरोधी पक्षनेते पदावरच सवाल करतात. आम्ही विकासाचे काम पुढे नेत आहोत. आता ते म्हणतात उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य आहे. आधी मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुद्धा हेच म्हणत होते. थोडा अभ्यास करून बोलले पाहिजे. एकनाथ शिंदे कामातून उत्तर देत आहे. लोकांनी कामांना पोचपावती दिली आहे. आम्ही घरी बसत नाही. त्यांनी याचे आत्मचिंतन करावे आणि आत्मपरीक्षण केले पाहिजे. आधी अधिवेशनाला पूर्ण वेळ बसा आणि मग बोला, असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 7:18 pm

अहवालानंतर कारवाई करणार

नवी दिल्ली : इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्याने तिकीट दरांत प्रचंड वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर केंद्र सरकारने तातडीने नवे नियम लागू केले. दरम्यान, इंडिगोची विमानसेवा नेमके कशामुळे विस्कळीत झाली? यासाठी नेमकं जबाबदार कोण? याबाबत केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मोठे भाष्य केलरे असून इंडिगोचा हा अत्यंत बेजबाबदारपणा असल्याचे मंत्री मोहोळ यांनी म्हटले […] The post अहवालानंतर कारवाई करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 7:12 pm

हिमालयाच्या जंगलात आग

डेहराडून : डिसेंबरच्या थंडीत हिमालयीन जंगलात आग भडकली आहे. यामुळे उत्तर भारतात वायू प्रदूषणाचा धोका आणखी वाढला आहे. बागेश्वर, चमोली, गोपेश्वर आणि उत्तराखंडच्या आसपासच्या भागात आग सतत पसरत आहेत. बागेश्वरच्या गढखेत रांगेतील रियुनी, लखमार आणि बगोटिया जंगलातही आग पसरली आहे. चमोलीतील पोखरी आणि अल्मोरा येथील रानीखेत भाग आगीने कवेत घेतला आहे. गढखेत वन परिक्षेत्र अधिकारी […] The post हिमालयाच्या जंगलात आग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 7:09 pm

१२० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भागात ६८ लॉन्चपॅड सक्रिय आहेत. तिथे ११० ते १२० दहशतवादी बसले आहेत, जे जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. गुप्तचर यंत्रणांनी भास्करला ही विशेष माहिती दिली आहे. सूत्रांनुसार, पुढील काही आठवड्यांत घुसखोरीचे प्रयत्न वाढू शकतात. नियंत्रण रेषेवरील(एलओसी) अनेक संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. […] The post १२० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 7:03 pm

'अण्णा लवकरच बाहेर येत आहेत':परळीत ऑडिओ क्लिप व्हायरल; मला संपवण्याचा कट रचला जात असल्याचा दीपक देशमुखांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांचे पती माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांजवळ तुम्ही दीपक देशमुख यांच्यासोबत राहू नका, अण्णा लवकरच बाहेर येत असून ते साहेबांच्या रडारवर आहेत असे बोलून मला जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप करत पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. परळी शहरात नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर मतदान यंत्रे असलेल्या स्ट्रॉंग रुमच्या सुरक्षेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार दीपक देशमुख हे सातत्याने आरोप करत आहेत. याप्रकरणी देशमुख यांच्यासह २० जणांविरोधात गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणात आता नवीन घटनेची भर पडली असून राजेभाऊ फड यांच्या संपर्क कार्यालयात दिपक देशमुख यांनी दि.७ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेत माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी आणि सुनील मस्के यांच्यात झालेल्या संभाषणाची क्लिप ऐकवत अण्णा लवकरच येत आहेत, दीपक साहेबांच्या रडारवर असून तुम्ही माझ्यासोबत रहा. बऱ्याच रजिस्ट्री करावयाच्या आहेत असे सांगून मला संपावण्याचा कट रचला जात आहे. नगरपालिकेतील स्ट्रॉंग रूम सुरक्षा संदर्भात झालेल्या गोंधळावेळी सर्वच पक्षाचे लोक असताना केवळ आमच्या उमेदवार व कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले गेले असून बाजीराव धर्माधिकारी यांचा सीडीआर तपासण्याची मागणी केली. तीन प्रभागांची फेर निवडणुकीची मागणी २ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात शहरातील प्रभाग क्रमांक १,११ आणि १२ मध्ये सीसीटीव्ही कॅमेर्यावर काळा पडदा टाकून बोगस मतदान केले जात होते. या प्रभागातील मतदान केंद्रावर मतदान नसलेले लोक सर्रासपणे वावरत होते. या तिन्ही प्रभागातील सीसीटीव्ही फुटेज घेऊन फेर मतदान घ्यावे, अशी मागणी दीपक देशमुख यांनी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 6:37 pm

‘बीआरओ’च्या १२५ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन

लेह : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी लडाखमध्ये सीमा रस्ते संघटनाच्या १२५ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यांनी याला इफड आणि केंद्राच्या सीमावर्ती पायाभूत सुविधांना बळकट करण्यासाठी एक मोठी उपलब्धी म्हटले. त्यांनी लडाखमधील दारबुक-श्योक-दौलत बेग ओल्डी रोडवर बांधलेल्या ९२० मीटर लांबीच्या श्योक बोगद्याचे, गलवान स्मारकाचे, तसेच काश्मीर, राजस्थान, चंदीगडसह इतर राज्यांमधील ५००० कोटी रुपयांच्या […] The post ‘बीआरओ’च्या १२५ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 6:31 pm

पुतिन यांच्या दौ-यानंतर पाक टेन्शनमध्ये

इस्लामाबाद : रशियाचे राष्ट प्रमुख व्लादिमीर पुतिन चार वर्षांनी भारत दौ-यावर आले होते. दिल्लीत पुतिन यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले. पण या दौ-यामुळे सर्वात जास्त अस्वस्थ पाकिस्तान होता. त्यांना मुख्य टेन्शन होते, पुतिन भारताला आणखी कोणती घातक शस्त्र देणार. एस-४०० ची कमाल त्यांनी पाहिलीच आहे. त्यामुळे पाकिस्तान पुतिन यांच्या भारत दौ-यामुळे टेन्शनमध्ये होता. पण […] The post पुतिन यांच्या दौ-यानंतर पाक टेन्शनमध्ये appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 6:28 pm

ही त्यांची जुनी पोटदुखी:उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचा पलटवार, महाविकास आघाडीवरही साधला निशाणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला 5 डिसेंबर 2025 रोजी एक वर्ष पूर्ण झाले असतानाच, राज्यातील राजकीय वातावरण मात्र विरोधी पक्षनेतेपदावरून चांगलेच तापले आहे. सरकारला वर्ष उलटूनही विधानसभेत विरोधी पक्षनेता का नेमला नाही, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जर नियमांवर बोट ठेवून विरोधी पक्षनेतेपद दिले जात नसेल, तर संविधानात नसलेले उपमुख्यमंत्रिपदही तात्काळ रद्द करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केल्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. सरकारच्या कारभारावर आणि विरोधी पक्षाला डावलण्याच्या नीतीवर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, सरकार विरोधी पक्षाला का घाबरत आहे? तुम्ही आम्हाला नियम आणि कायदे दाखवत असाल, तर संविधानात उपमुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे हे पद घटनाबाह्य असून ते रद्द केले पाहिजे. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. भाजप हा महायुतीतील शिंदे आणि पवार गटाला अ‍ॅनाकोंडासारखा गिळल्याशिवाय राहणार नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली. शिंदे आणि पवार गट ही भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोपही त्यांनी केला. एकनाथ शिंदेंचा पलटवार उद्धव ठाकरे यांच्या या मागणीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी ठाकरेंच्या टीकेला 'पोटदुखी'ची उपमा दिली. शिंदे म्हणाले, काही लोकांना अजूनही पोटदुखी आहे. मी मुख्यमंत्री होतो, तेव्हाही त्यांना पोटदुखी होती आणि आता मी उपमुख्यमंत्री झालो आहे, तरीही त्यांची पोटदुखी कायम आहे. त्यांच्या उपचारासाठी आम्ही 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजना सुरू केली, पण तरीही फरक पडत नाही. एकनाथ शिंदे यांनी पुढे ठाकरेंच्या 'वर्क कल्चर'वरही टीका केली. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा ते मला घटनाबाह्य म्हणत होते, आता उपमुख्यमंत्रिपदाला घटनाबाह्य म्हणत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तुम्ही घरात बसून राहिलात, बाहेर पडलाच नाही. त्यामुळेच जेव्हा पत्रकार विचारतात की मविआ कुठे आहे, तेव्हा आम्ही सांगतो की ते घरी बसले आहेत, असा सणसणीत टोला शिंदे यांनी लगावला. दरम्यान, महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेतेपद आणि उपमुख्यमंत्रिपदाची वैधता यावरून सुरू झालेली ही राजकीय जुगलबंदी पाहता, आगामी काळात आणि विधिमंडळ अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 6:25 pm

अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, हे सरकार लोकशाहीविरोधी:अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भास्कर जाधवांचा हल्लाबोल; विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवण्यावरून संताप

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत महायुती सरकारच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. सरकारच्या 'एककल्ली, मनमानी आणि भ्रष्ट' कारभाराचा तीव्र निषेध करत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानावर बहिष्कार टाकला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्ला चढवत, या सरकारने भ्रष्टाचाराच्या आणि मनमानीच्या सर्व सीमा ओलांडल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेता नसणे हा संविधानाचा अवमान चहापानाचे निमंत्रण नाकारताना भास्कर जाधव यांनी सरकारवर लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप केला. ते म्हणाले, विरोधी पक्षनेतेपदाची दोन्ही सभागृहातील पदे रिक्त ठेवणे हा संविधानाचा अवमान आहे. हे पद केवळ परंपरा नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संवैधानिक पद आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी 10 टक्के सदस्यसंख्येची अट असल्याचा सरकारचा दावा 'संपूर्ण खोटा' असल्याचे सांगत, त्यांनी याबाबत प्रधान सचिवांच्या लेखी उत्तराचा दाखला दिला. क्लीन चिट देणारे सरकार आणि विकलांग महाराष्ट्र राज्यात दोन उपमुख्यमंत्री हे पद संविधानात नसतानाही केवळ राजकीय तडजोडीसाठी निर्माण केले गेले आणि आज सत्तेतील तिन्ही पक्ष भ्रष्टाचाराच्या स्पर्धेत उतरले आहेत, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. विरोधी पक्षांच्या आमदारांना निधी न देऊन या सरकारने अर्धा महाराष्ट्र विकलांग केला आहे, असा घणाघात त्यांनी केला. तसेच, राज्यात गुन्हे घडले की मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून आरोपींना लगेच 'क्लीन चिट' दिली जाते, ज्यामुळे कायद्याचा धाक उरलेला नाही, असेही ते म्हणाले. राम शिंदे यांच्यावरही निशाणा रोहित आर्या प्रकरण आणि सभापतींवर टीका कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवताना भास्कर जाधव यांनी रोहित आर्या कंत्राटदार प्रकरणाचा उल्लेख केला. या प्रकरणात पुरावे नष्ट करण्यासाठीच सरकारने गोळीबार घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला. लोकशाही नको आणि मनुस्मृती हवी, हीच त्यांची मानसिकता आहे, असा टोला लगावत, गेली अडीच वर्षे सभापतीपद रिक्त ठेवणाऱ्यांनी आता परंपरांचे दाखले देऊ नयेत, असे खडे बोल जाधव यांनी सुनावले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 5:53 pm

कार्यालयीन वेळेनंतर वरीष्ठ फोन करून त्रास देऊ शकणार नाहीत

नवी दिल्ली : देशातील नोकरदार वर्गासाठी एक अत्यंत दिलासा देणारे विधेयक संसदेत सादर झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात राईट टू डिसकनेक्ट बिल, २०२५ हे खासगी सदस्य विधेयक लोकसभेत सादर केले. या विधेयकामुळे कर्मचा-यांना कार्यालयीन वेळेनंतर कामाशी संबंधित कॉल, ईमेल किंवा मेसेजला उत्तर देणे […] The post कार्यालयीन वेळेनंतर वरीष्ठ फोन करून त्रास देऊ शकणार नाहीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 5:47 pm

भाजपचा मुख्य फंडा धार्मिक ध्रुवीकरण, मतचोरी:बाळासाहेब थोरात यांचे 'लोकशाहीची हत्या' प्रदर्शनातून पुणेकरांना आवाहन

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. सत्तेत राहण्यासाठी भाजप धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरीचा वापर करत असून, ईव्हीएम प्रक्रियेबाबतही गंभीर शंका निर्माण झाल्याचे ते म्हणाले. लोकशाही वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित 'सेवा, कर्तव्य, त्याग' सप्ताह कार्यक्रमात 'लोकशाहीची हत्या व वोटचोरी' या विषयावरील विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. थोरात यांनी आपल्या भाषणात सांगितले की, २००४ ते २०१४ या काळात काँग्रेस सरकारने अन्न सुरक्षा कायदा, शैक्षणिक योजना, भू-अधिग्रहण कायद्यात सुधारणा आणि पोलिओ निर्मूलन यांसारखे अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवले. मात्र, २०१४ नंतर भाजपने तांत्रिक साधने, अफवा आणि जातीय ध्रुवीकरणाचा वापर करून सत्ता मिळवली आणि देशाची दिशा भरकटवली. महाराष्ट्र हा संतांची परंपरा जपणारा प्रदेश असताना, आज धर्माचे उघडपणे राजकारण केले जात आहे, यावर थोरात यांनी चिंता व्यक्त केली. सोनम वंगचुक, हरियाण्यातील शेतकरी आंदोलन, महिला ऑलिम्पिक विजेत्यांचे आंदोलन यांसारख्या घटनांनंतरही समाजाची उदासीनता लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत त्यांनी मांडले. यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले की, मोदी सरकार मतचोरीच्या विशिष्ट पॅटर्नवर सत्तेत आले आहे, जी जनतेची आणि लोकशाहीची मोठी फसवणूक आहे. निवडणुकांचे निकाल पुढे ढकलणे आणि ईव्हीएमच्या जोरावर सत्ता मिळवणे ही पद्धत लोकशाहीसाठी धोकादायक आहे. मोदी सरकारला रोखण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची आणि सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले की, विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी आवाज उठविल्यामुळे जनजागृतीला गती मिळाली आहे. आपले मत नक्की कुठे आणि कसे जाते याचा शोध घेण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आला असून आर्थिक भ्रष्टाचारासोबत मतचोरी ही भाजपची मोठी चाल असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 5:45 pm

इंडिगोचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या परिचालन संकटातून जात आहे. गेल्या काही दिवसांत इंडिगोच्या शेकडो विमानांचे उड्डाण रद्द झाल्यामुळे दिल्ली, मुंबई आणि पुणे यांसारख्या प्रमुख विमानतळांवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. अशातच लोक विमान कंपनीसोबत डीजीसीएला देखील दोष देत आहेत. जर नवीन नियमांमुळे विमान कंपनीचे पायलट सुटीवर होते, […] The post इंडिगोचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 5:39 pm

समुद्राचे पाणी विषारी होतेय, समुद्री जीवसृष्टी धोक्यात

स्कॉटलंड : स्कॉटलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँर्ड्यूज येथील एका नवीन संशोधनाने गंभीर इशारा दिला आहे की, जगातील अनेक किनारी भाग पूर्वीच्या अंदाजे वेगापेक्षा अधिक जलद गतीने आम्लधर्मी (अ‍ॅसिडिक) होत आहेत. ‘नेचर कम्युनिकेशन्स’मधील प्रकाशित अभ्यासानुसार, कॅलिफोर्निया करंटसारख्या ‘अपवेलिंग’ क्षेत्रांमध्ये ही प्रक्रिया, वातावरणातील कार्बन डायऑक्साइडच्या वाढीमुळे होणा-या सामान्य अ‍ॅसिडिफिकेशनपेक्षा वेगवान आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात येत आहे. […] The post समुद्राचे पाणी विषारी होतेय, समुद्री जीवसृष्टी धोक्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 5:38 pm

मस्क्युलर डिस्ट्रॉफीवरील लसीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार:एकनाथ शिंदे यांची ग्वाही; गरजू रुग्णांसाठी 100 अतिरिक्त इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा

मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा जरी दुर्मीळ आणि आव्हानात्मक आजार असला, तरी यावर मात करण्यासाठी झगडणाऱ्या मुलांची इच्छाशक्ती अत्यंत प्रबळ आहे. त्यांच्या या 'विलपॉवर'ला सलाम करत राज्य शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. इतकेच नव्हे, तर या आजारावर लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करेल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. स्वर्गीय गंगुबाई शिंदे सभागृहात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात मस्क्युलर डिस्ट्रॉफीने ग्रस्त मुले आणि गरजू रुग्णांना इलेक्ट्रिक व्हीलचेअर तसेच ‘वॅटमेड बायपॅप’ मशीनचे वितरण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, डॉ. मंगेश पेडामकर आणि हरिश्चंद्र सावंत उपस्थित होते. सार्वजनिक वाहतूक 'दिव्यांग-स्नेही' करणार रुग्णांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करताना शिंदे यांनी सांगितले की, एसटी, मेट्रो आणि मोनोरेल यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांच्या प्रवासासाठी अनुकूल आणि विशेष सुविधा निर्माण केल्या जातील. तसेच, या रुग्णांसाठी फिजिओथेरपी अत्यंत महत्त्वाची असल्याने त्याचा खर्च कमी करण्यासाठी सीएसआर निधी, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि लोकसहभागातून व्यापक मदत उभी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरात लवकरच सुसज्ज 'थेरपी सेंटर' उभारण्याबाबतच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. 100 अतिरिक्त व्हीलचेअरची तत्काळ मदत रुग्णांची वाढती गरज पाहता, एकनाथ शिंदेंनी कार्यक्रमातच तत्काळ 100 अतिरिक्त इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा केली. यासोबतच गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि पोर्टेबल व्हेंटिलेशन उपकरणे उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. या मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य टिकवण्यासाठी जे शक्य आहे, ते सर्व प्रयत्न शासन करेल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 5:31 pm

वांद्रे आणि वरळीतील राड्यानंतर मातोश्रीवर खलबते:उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक; भाजपची मक्तेदारी मोडून काढा, ज्येष्ठ नेत्यांना सूचना

मुंबईत गेल्या काही दिवसांत वांद्रे आणि वरळी येथील सेंट रेजिस हॉटेलमध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झालेल्या राड्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कामगार क्षेत्रात भाजपची वाढती घुसखोरी रोखण्यासाठी आणि त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी 'मातोश्री'वर अखिल भारतीय कामगार सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी भाजपची मक्तेदारी मोडून काढण्याचे आदेश देतानाच, पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांची चांगलीच शाळा घेतली. भारतीय कामगार सेना ही कुणाचीही वैयक्तिक जहागिरी नाही, त्यामुळे एकसंघ राहून काम करा, अशा कडक शब्दांत ठाकरेंनी नेत्यांचे कान टोचले आहेत. बैठकीत नेमके काय घडले? राज्यातील विविध भागांतील कामगार सेनेच्या युनिट्सचे पदाधिकारी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर दाखल झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या अंतर्गत कारभारावर बोट ठेवले. कामगारांच्या हितासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी कामगार सेनेने आपला आवाज अधिक तीव्र केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संघटनेत गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, भारतीय कामगार सेना म्हणून सर्वांनी एकजूट दाखवावी, असा सज्जड दमही त्यांनी भरला. भाजपला शह देण्यासाठी रणनीती शिवसेना ठाकरे गटाचा कणा मानल्या जाणाऱ्या कामगार सेनेचे जाळे मुंबईसह राज्यभरातील हॉटेल्स, विमानतळ, मोठे कारखाने आणि कंपन्यांमध्ये पसरलेले आहे. मात्र, अलीकडच्या काळात भाजपनेही स्वतःच्या कामगार संघटना स्थापन करून शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपच्या या रणनीतीला शह देण्यासाठी आता स्वतः उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या कामकाजात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. आजच्या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच, जिथे भाजप कामगार संघटना घुसखोरी करतील किंवा दादागिरी करतील, तिथे त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचे आणि पलटवार करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. भाजपचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी आता कामगार सेनेने जुन्या आक्रमक शैलीत काम करावे, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला आहे. आगामी काळात मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामगार सेनेची ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. हे ही वाचा... विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवून संविधानाचा अवमान:विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, शेतकरी प्रश्नांवरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणे हा संविधानाचा अपमान असून, सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पूर्ण बातमी वाचा...

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 5:03 pm

सत्ताधारी पक्षाचाच शासकीय यंत्रणेवर अविश्वास?:शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराची ईव्हीएमसाठी 'खासगी' सुरक्षा; जळगावात राजकीय चर्चांना उधाण

एकीकडे महाविकास आघाडीकडून ईव्हीएममध्ये फेरफार होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच, आता खुद्द सत्ताधारी पक्षातील आमदाराचाच प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेवर भरोसा नसल्याचे धक्कादायक चित्र जळगावात पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा आणि भडगाव येथील ईव्हीएम 'स्ट्राँग रूम'च्या बाहेर चक्क स्वतःचे खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. पोलिस बंदोबस्त असतानाही खासगी फौजफाटा लावल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत पाचोरा आणि भडगाव या दोन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या मित्रपक्षातच अटीतटीचा सामना रंगला आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन्स स्ट्राँग रूममध्ये सील करण्यात आल्या असून, 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र, निकालाची धाकधूक आणि स्थानिक पातळीवरील तीव्र स्पर्धेमुळे उमेदवारांच्या आग्रहाखातर आमदार किशोर पाटील यांनी शासकीय सुरक्षेच्या जोडीला गणवेशधारी खासगी रक्षकांचा पहारा बसवला आहे. हे खासगी रक्षक स्ट्राँग रूमच्या परिसरावर करडी नजर ठेवून आहेत. विशेष म्हणजे, स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी नियमानुसार चोख पोलिस बंदोबस्त तैनात असतो. असे असतानाही सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था उभारल्याने, सरकार आपल्याच पक्षाचे असूनही प्रशासनावर विश्वास नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. ईव्हीएम सुरक्षिततेबाबत खुद्द सत्ताधाऱ्यांच्या मनातच शंका असल्याने हा मुद्दा आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. एरंडोल येथील स्ट्रॉंग रूमबाहेरील सीसीटीव्ही बंद दरम्यान, जळगाव जिल्ह्यात इतरत्रही ईव्हीएम सुरक्षेवरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. एरंडोल येथे स्ट्राँग रूमबाहेरील सीसीटीव्ही डिस्प्ले तब्बल अडीच तास बंद पडल्याचा प्रकार समोर आला. यावर आक्षेप घेत उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. तर धरणगावमध्ये विरोधी पक्षाचे कार्यकर्ते स्वतः रात्रभर जागी राहून स्ट्राँग रूमवर पाळत ठेवत आहेत. राज्यभरात ईव्हीएमवरून गदारोळ सुरू असताना जळगावातील या घडामोडींनी निवडणुकीच्या निकालाबाबतची उत्सुकता आणि तणाव वाढवला आहे. स्ट्राँग रूमबाहेर उमेदवारांचा कडक पहारा परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी स्ट्राँग रूमवर 24 तास पहारा देत आहे.तंत्रज्ञानाचे युग असल्यामुळे आम्हाला कोणावर विश्वास नसल्यामुळे आम्ही पहारा देत असल्याचा कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रत्येक प्रभागाच्या दोन नगरसेवक 24 तास स्ट्रॉंग रूममध्ये पहारा देत आहे.जिंतूर नगरपालिकेत भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी लढत रंगली आहे. मतदान यंत्र सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा नाशिक जिल्ह्यातील येवला येथील मतदान यंत्र सुरक्षा कक्षे बाहेर पोलिसांसह उमेदवारांची खाजगी सुरक्षा लावण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांनी मतदान यंत्र सुरक्षा कक्षे बाहेर खाजगी सुरक्षा रक्षक नेमले. सीसीटीव्ही आणि पोलिसांचा मतदान यंत्र सुरक्षा कक्षे बाहेर खडा पहारा देत आहेत. मतमोजणीपूर्वी सुरू झालेली सुरक्षा स्पर्धा जनतेत आणि कार्यकर्त्यांत कुतूहलचा विषय ठरला आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 5:01 pm

बावनकुळेंची नोटीस अद्याप मिळालेली नाही:कोणत्याही परिस्थितीत माफी मागणार नाही, सुलेखा कुंभारेंचा महसूलमंत्र्यांवर पलटवार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कायदेशीर नोटीस पाठवल्याची बातमी मीडियात पसरवली असली तरी, मला अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असा दावा माजी राज्यमंत्री तथा बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा अॅड. सुलेखा कुंभारे यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत माफी मागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. एका निवेदनाद्वारे कुंभारे यांनी बावनकुळेंच्या कृतीचा जाहीर निषेध केला. महसूलमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री यांसारख्या जबाबदार पदावर असलेल्या मंत्र्याने अशा पद्धतीने खोटी बातमी मीडियात पसरवणे अशोभनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी बावनकुळेंच्या कायदेशीर नोटीसची वाट पाहत आहे. नोटीस मिळाल्यास कायदेशीर भाषेत चोख उत्तर देणार असल्याचे कुंभारे यांनी सांगितले. आम्ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भीमसैनिक आहोत, आम्ही लढायला भीत नाही. ताकदीने लढाई लढणार आणि जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बावनकुळेंनी मीडियातून माफी मागण्याची किंवा कायदेशीर लढाईला तयार राहण्याची धमकी दिली आहे. मात्र, मी माझ्या शब्दावर ठाम असून कोणत्याही परिस्थितीत माफी मागणार नाही, असे कुंभारे यांनी स्पष्ट केले. त्यांची लढाई कामठी नगरपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांकडून मतचोरीसाठी झालेल्या गंभीर प्रकाराबाबत आहे. मोठ्या प्रमाणावर पैशांचा गैरवापर करून अग्रवाल भवन आणि एस. फार्मवर घडलेल्या गैरकायदेशीर प्रकाराने निवडणूक आचारसंहितेचे भाजप उमेदवारांकडून थेट उल्लंघन झाले. त्याविरुद्ध आवाज उचलण्याचा लोकशाहीत आम्हाला अधिकार आहे, असे कुंभारे म्हणाल्या. एस. फार्मवर मिळालेले आक्षेपार्ह साहित्य, भाजप उमेदवार अग्रवाल यांचा पुतण्या, बोगस मतदार आणि बोटाची शाई मिटवणारे लिक्विड घटनास्थळी निवडणूक अधिकारी व पोलीस प्रशासनाने जप्त केले होते. हा प्रकार बावनकुळेंना मान्य असेल, तर या मतचोरीला बावनकुळेंचे राजकीय संरक्षण आहे, असा आरोपही कुंभारे यांनी केला. याशिवाय, पुण्यातील महारवतनाच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार हे मुख्य आरोपी आहेत, असे कुंभारे यांनी म्हटले आहे. पार्थ अजित पवार यांच्याकडे कंपनीचे ९९% शेअर्स असतानाही त्यांचे एफआयआरमध्ये नाव नाही किंवा त्यांना अटकही झाली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हा घोटाळा महसूल खात्यांतर्गत झालेला आहे. बावनकुळे महसूलमंत्री असल्याने या मोठ्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन करून सरकारने पळवाट काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मी बोललेल्या शब्दांवर कायम आहे. या जमीन घोटाळ्याला बावनकुळे स्वतः जबाबदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी मागणीही कुंभारे यांनी या निवेदनात केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 4:36 pm

39 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये विजेत्यांची घोषणा:इथिओपियाचा टेरेफे हैमानोत पुरुष गटात, तर साक्षी जडियाल महिला गटात अव्वल

39व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत रविवार, 7 डिसेंबर रोजी पूर्ण मॅरेथॉन पुरुष गटात इथिओपियाच्या टेरेफे हैमानोतने (2 तास 20 मिनिटे 08 सेकंद) तर महिला गटात भारताच्या साक्षी जडियालने (2 तास 39 मिनिटे 37 सेकंद) विजेतेपद पटकावले. 42.195 किमीच्या या पूर्ण मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात इथिओपियाचा मिको देरेजे अलेनू (2 तास 20 मिनिटे 09 सेकंद) दुसऱ्या स्थानावर राहिला, तर भारताच्या त्रिथा पुनने (2 तास 20 मिनिटे 17 सेकंद) तिसरा क्रमांक पटकावला. महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये इथिओपियाची इडो टूलो (2 तास 40 मिनिटे 56 सेकंद) दुसऱ्या स्थानी, तर इथिओपियाची वारे डेमिसी (2 तास 50 मिनिटे 46 सेकंद) तिसऱ्या स्थानी राहिली. अर्ध मॅरेथॉन पुरुष गटात भारताच्या सचिन यादवने (1 तास 3 मिनिटे 43 सेकंद) प्रथम क्रमांक मिळवला. राज तिवारी (1 तास 3 मिनिटे 44 सेकंद) दुसऱ्या स्थानी, तर मुकेश कुमार (1 तास 4 मिनिटे 3 सेकंद) तिसऱ्या स्थानी होते. महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये भारताच्या भारती (1 तास 13 मिनिटे 59 सेकंद) हिने विजेतेपद पटकावले. रविणा गायकवाड (1 तास 15 मिनिटे 58 सेकंद) दुसऱ्या, तर तसेहय देसजन (1 तास 18 मिनिटे 19 सेकंद) तिसऱ्या क्रमांकावर राहिली. या प्रमुख स्पर्धांव्यतिरिक्त 10 किमी, 5 किमी आणि व्हीलचेअर स्पर्धाही उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचा प्रारंभ पहाटे 3 वाजता सणस मैदानाजवळच्या हॉटेल कल्पना - विश्व चौकातून ऍड. अभय छाजेड यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून करण्यात आला. सर्व गटांतील स्पर्धकांचे सामने पूर्ण झाल्यानंतर सणस मैदानावर बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार, अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, विशाल चोरडिया, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, आबा बागुल, प्रशांत जगताप, संजय मोरे, सुनील शिंदे, लता राजगुरू, डॉ. सतीश देसाई, संगीता तिवारी, डॉ. राजेंद्र जगताप, सचिन आडेकर, यासिन शेख, अक्षय जैन, रेस डायरेक्टर सुमंत वायकर, जॉईंट रेस डायरेक्टर रोहन मोरे आणि गुरुबंस कौर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे विश्वस्त ऍड. अभय छाजेड यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खेळाडूंच्या एकजुटीचे कौतुक केले आणि नागरिकांनी देशाच्या प्रगतीसाठी सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले. आजची मेरेथॉनची गर्दी त्यादृष्टीने खूप आश्वास्क आहे असे सांगून त्यांनी आयोजक अभय छाजेड व संयोजकांचे कौतुक केले. यास्पर्धेला पुणे महानगरपालिकेने 35 लाख रुपयांची बक्षिसे दिली. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व गटातील सर्व खेळाडूंना फिनिशिंग मेडल देण्यात आले. 15 हजारहून अधिक धावपटू यात सहभागी झाले होते. कार्यक्रमच्या शेवटी रेस डायरेक्टर सुमंत वायकर यांनी आभार मानले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 4:27 pm

सुप्रिया सुळे, कंगना रणौत अन् महुआ मोईत्रांचा एकत्र डान्स:भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नातील व्हिडिओ व्हायरल

संसदेत एकमेकींच्या विरोधात आगपाखड करणाऱ्या आणि विचारधारांच्या भिंती उभ्या असणाऱ्या नेत्या जेव्हा खासगी कार्यक्रमात 'डान्स फ्लोअर'वर एकत्र येतात, तेव्हा भुवया उंचावणे साहजिक आहे. भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नसमारंभात असाच एक प्रसंग घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूलच्या महुआ मोईत्रा आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी एकाच गाण्यावर ठेका धरला असून, त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे, कंगना रनौट आणि महुआ मोईत्रा यांचा नृत्याची रिहर्सल करतानाचा फोटो समोर आला होता. आता प्रत्यक्ष कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात या तिन्ही नेत्या 'ओम शांती ओम' चित्रपटातील गाण्यावर उत्साहात नृत्य करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यजमान आणि भाजप खासदार नवीन जिंदाल हेदेखील व्यासपीठाच्या मध्यभागी उपस्थित असून त्यांनीही या आनंदाच्या क्षणी ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. नेटकऱ्यांचा संताप : 'जनतेला मूर्ख बनवताय का?' राजकीय मतभेद बाजूला ठेवून नेत्यांनी एकत्र येणे ही चांगली बाब असली तरी, या व्हिडिओवरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. 'राजकीय वैर फक्त कॅमेऱ्यापुरते असते, प्रत्यक्षात हे सर्वजण एकच आहेत,' अशा शब्दांत नेटकरी आपला रोष व्यक्त करत आहेत. विशेषतः कंगना रणौतने यापूर्वी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांचे पडसाद या व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा उमटले आहेत. सोशल मीडियावरील 'डॉ. निमो यादव' आणि 'अमॉक' या हँडल्सवरून या प्रकारावर सडकून टीका करण्यात आली आहे. ज्या कंगनाने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटले होते, त्याच कंगनासोबत भाजपविरोधी बाकांवरील सुप्रिया सुळे आणि महुआ मोईत्रा डान्स कसा करू शकतात? असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा राजकारण्यांच्या दुटप्पीपणाचा कळस असून, सामान्य जनतेला मूर्ख बनवण्याचा हा प्रकार असल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. रिहर्सलच्या फोटोवरूनच सुरू होती चर्चा लग्नापूर्वी कंगना रणौतने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून नृत्याच्या तालीमचा फोटो शेअर केला होता. 'सहकारी खासदारांसोबत सिनेमातील क्षण अनुभवले,' असे कॅप्शन तिने दिले होते. तेव्हापासूनच या अनोख्या 'राजकीय जुगलबंदी'ची चर्चा रंगली होती.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 4:24 pm

अटल फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश मंत्रीपदी पद्माकर केदार यांची नियुक्ती

परभणी : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांवर आधारित सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्य करणा-या अटल फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती अपर्णा सिंह यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांच्या सक्रिय नेतृत्वात रेणापूर तालुक्यातील व्होटी येथील पद्माकर केदार यांची फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयात […] The post अटल फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश मंत्रीपदी पद्माकर केदार यांची नियुक्ती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 4:22 pm

मृदुला गर्ग यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन

पुणे : प्रतिनिधी पुढील महिन्यात सातारा येथे होत असणा-या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे. दि. १ ते ४ जानेवारी या कालावधीत संमेलन होत असून भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती […] The post मृदुला गर्ग यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 4:20 pm

स्मृती मानधनानेच पलाशसोबतचे लग्न मोडले; स्वत: केली पोस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबद्दल सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. स्मृती मानधनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक महत्त्वाची घोषणा करत, पलाश मुच्छलसोबतचा तिचा विवाह सोहळा रद्द झाल्याचे जाहीर केले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून स्मृती आणि पलाशच्या लग्नाबद्दल जोरदार चर्चा होती. लग्नापूर्वी […] The post स्मृती मानधनानेच पलाशसोबतचे लग्न मोडले; स्वत: केली पोस्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 4:19 pm

‘हापूस ‘नामांकनावरून विरोधकांचा आरोप

रत्नागिरी : प्रतिनिधी महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले गेल्याचा आरोप नेहमीच होतो. आता महाराष्ट्राचा आणि कोकणचा हापूस जगप्रसिद्ध आहे, मात्र येथेही गुजरातकडून महाराष्ट्रात घुसखोरी आणि पळवापळवी होत असल्याचे समोर आले आहे. गुजरातमधील वलसाडच्या आंब्याला हापूस नामांकन मिळावे यासाठी अर्ज करण्यात आला आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी […] The post ‘ हापूस ‘ नामांकनावरून विरोधकांचा आरोप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 4:18 pm

कोल्हापूरच्या राजकारणात मोठी घडामोड:माजी महापौर सई खराडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश, शिंदे गटाची ताकद वाढणार

कोल्हापूर शहराच्या राजकारणात आज अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड घडत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर सई खराडे या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत. ठाणे येथे हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला असून, स्वतः एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सई खराडे यांचा पक्षात सन्मानपूर्वक प्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशामुळे कोल्हापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर हे देखील विशेष उपस्थित राहणार आहेत, ज्यामुळे या कार्यक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे सई खराडे यांच्यासह त्यांचे चिरंजीव शिवतेज खराडे हे सुद्धा शिंदे गटात सामील होत आहेत. केवळ सई खराडेच नव्हे, तर त्यांच्यासोबत युवा पिढीतील शिवतेज खराडे यांच्या प्रवेशामुळे पक्षाला तरुण रक्ताची आणि नव्या उर्जेची साथ मिळणार आहे. सई खराडे यांची कोल्हापूरच्या राजकारणात एक अनुभवी नेत्या अशी ओळख आहे. त्यांनी यापूर्वी शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर प्रभागातून दोन वेळा कोल्हापूर महानगरपालिकेत प्रतिनिधित्व केले आहे, तसेच 2005 साली त्यांनी कोल्हापूरचे महापौरपदही भूषविले होते. त्या कृषीभूषण कै. महिपतराव उर्फ पापा बेंद्रे यांच्या कन्या आणि माजी नगराध्यक्ष कै. सखारामबापू खराडे यांच्या स्नुषा आहेत. असा भक्कम राजकीय आणि सामाजिक वारसा त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांच्या या निर्णयाचे मोठे वजन मानले जात आहे. सई खराडे यांच्या या प्रवेशामुळे कोल्हापूरमध्ये शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, एका अनुभवी माजी महापौरांची साथ मिळाल्याने शिंदे गटाचे स्थान शहरात अधिक बळकट होईल. राज्य आणि जिल्हास्तरीय नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोहळ्यामुळे कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणावर आणि महानगरपालिकेच्या गणितांवर दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 4:16 pm

उद्या मुंबईही गुजरातची झालेली दिसेल!

नागपूर : प्रतिनिधी जर चेतक घोड्याची आई गुजराती असू शकते, तर हापूस आंबा का असू शकत नाही? उद्या मुंबईही गुजरातची झालेली दिसेल! अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत सत्ताधा-यांवर ‘इतिहास बदलण्याचा प्रयत्न’ केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. हापूसवरील हा कृषी-आर्थिक वाद आता स्पष्ट राजकीय रंगात परिवर्तित झाला आहे. स्थानिक स्वराज्य […] The post उद्या मुंबईही गुजरातची झालेली दिसेल! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 4:16 pm

‘मोटा हो जाऊंगा’ म्हणत रोहितने नाकारला केक

मुंबई : प्रतिनिधी रोहित शर्मा आणि किस्से सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिस-या वनडेत रोहित आणि कुलदीप यादव यांच्यात डीआरएसवरून रंगलेली मजेशीर जुगलबंदी सगळ्यांनीच अनुभवली. सामना संपल्यानंतर रोहितचा आणखी एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहितने गेल्या काही महिन्यांमध्ये जिममध्ये घाम गाळत मेहनतीने वजन कमी केले आहे. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याची चपळता वाखाणण्याजोगी […] The post ‘मोटा हो जाऊंगा’ म्हणत रोहितने नाकारला केक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 4:14 pm

महिलेवर सामूहिक अत्याचार; आरोपीला अटक

ठाणे : प्रतिनिधी ठाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाणे फॅमिली न्यायालयाच्या आवारात एका महिलेला तिच्या वाढदिवसाच्या केकमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे, तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. पोलिस या घटनेचा सविस्तर तपास करत असून ठाण्यासारख्या गजबजलेल्या परिसरात ही घटना […] The post महिलेवर सामूहिक अत्याचार;आरोपीला अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 4:13 pm

इंडिगो पूर्ववत होतेय पण कारवाई होणार; मंत्री मोहोळांचे स्पष्टीकरण

पुणे : प्रतिनिधी केंद्रातील नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी (ता. ७ डिसेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गेले काही दिवस विमानप्रवाशांना खूप त्रास झाला आहे. प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. खरं तर इंडिगोच्या व्यवस्थापनाने मागील दोन-तीन महिन्यांत ज्या तांत्रिक गोष्टी करायला हव्या होत्या, त्या केल्या नाहीत आणि […] The post इंडिगो पूर्ववत होतेय पण कारवाई होणार; मंत्री मोहोळांचे स्पष्टीकरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 4:12 pm