बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या संपणार आहे. अशातच राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग घेतला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा फोन करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे बारामतीचा हा रणसंग्राम 'तुल्यबळ' होणार की 'बिनविरोध', याचा फैसला आता काँग्रेसच्या दिल्लीतील 'हाय कमांड'च्या निर्णयावर अवलंबून आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भावनिक ओलावा आणि राजकीय सौहार्द जपण्यासाठी महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार स्वतः रिंगणात आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्याने काँग्रेसने आकाश मोरे यांना मैदानात उतरवले आहे. या पार्श्वभूमीवर, सुनेत्रा पवारांनी सपकाळांशी चर्चा करून काँग्रेसने माघार घ्यावी, अशी विनंती केली आहे. काँग्रेसची 'वेट अँड वॉच' भूमिका सुनेत्रा पवारांच्या विनंतीनंतर काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, बारामती पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय हा पक्षाच्या दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाचा आहे. त्यामुळे उमेदवारी मागे घ्यायची की नाही, यासाठी दिल्लीतील श्रेष्ठींशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, उद्या ९ एप्रिल हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष काँग्रेसच्या भूमिकेकडे लागले आहे. 'वर्षा'वर खलबते; फडणवीसांकडून सुनेत्रा पवारांना पाठिंबा दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. सुमारे २० मिनिटे चाललेल्या या बैठकीत पोटनिवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली. यावेळी भाजप 'मोठा भाऊ' म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहील, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे निवडणुकीत भाजप सुनेत्रा पवारांना आवश्यक ती मदत करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामतीचा तिढा सुटणार का? दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. मात्र, शरद पवारांच्या पक्षाने या जागेवर उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी काँग्रेसने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. आता सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देऊन काँग्रेस 'बॅकफूट'वर जाते की आकाश मोरे यांच्या माध्यमातून महायुतीला तगडे आव्हान देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. बारामती पोटनिवडणुकीतून 6 उमेदवारांची माघार दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, आज दिवसभरात 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. विलास होळकर ,माऊली कांबळे, रजाक मुलाणी ,राहुल थोरात, अमोल कोकरे ,अशोक खामगळ यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. उद्या गुरुवार 9 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या किती जण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरुवातीला 53 वैध अर्जांपैकी सहा जणांनी माघार घेतल्याने सध्या तरी 47 उमेदवार रिंगणात उरले आहेत. मात्र उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बारामतीत मोठ्या राजकीय हालचाली होण्याची आणि चित्र बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवनिर्माण, सर्जनशील विचार यशाची गुरुकिल्ली:व्हीएनआयटी नागपूरचे डॉ. सतीश श्रीवास्तव यांचे प्रतिपादन
व्हीएनआयटी नागपूरच्या फायनान्शिअल इंजिनिअरिंग विभागाचे डॉ. सतीश श्रीवास्तव यांनी 'आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग'चे महत्त्व सांगितले. अमरावती येथील जी. एच. रायसोनी विद्यापीठात 'सदा ज्ञान व्याख्यानमाला' अंतर्गत सोमवारी त्यांनी हे प्रतिपादन केले. डॉ. श्रीवास्तव म्हणाले की, जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी नेहमी नवीन आणि रचनात्मक विचार करणे आवश्यक आहे. हीच 'आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग'ची कला तुम्हाला प्रत्येक कठीण परिस्थितीतून बाहेर काढते, तणाव, नैराश्य आणि निराशापासून दूर ठेवते आणि भविष्यात तुमची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास मदत करते. यावेळी कुलपती डॉ. विनायक देशपांडे अध्यक्षस्थानी होते, तर कुलसचिव डॉ. स्नेहिल जायस्वाल आणि विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. श्रीवास्तव यांनी प्रगतीसाठी नवीन विषय, नवाचार आणि स्वतंत्र विचारांची गरज असल्याचे अधोरेखित केले. हे सर्व 'बॉक्स'च्या बाहेर विचार करण्यातूनच शक्य होते. ते पुढे म्हणाले की, आपले विचार स्वतःचे, स्वतंत्र आणि स्पष्ट असावेत, त्यात कोणतीही दुविधा किंवा संदिग्धता नसावी. विचार केवळ मनात न ठेवता त्यांची अंमलबजावणी गांभीर्याने करावी. अनेकदा युवक काही नवीन करण्याचा निश्चय करतात, परंतु त्यांचे विचार स्वतंत्र नसल्याने ते दुविधेत अडकतात. परिणामी इच्छित यश मिळत नाही आणि त्यामुळे नैराश्य, तणाव व निराशा वाढते. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सतत 'आउट ऑफ बॉक्स' विचारसरणी ठेवणे गरजेचे आहे. व्याख्यानादरम्यान डॉ. श्रीवास्तव यांनी देशातील अनेक यशस्वी उद्योजकांच्या उदाहरणांचा उल्लेखही केला. कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. प्रकाश नारायण यांनी आभार मानले. सचिन देशपांडे, कुणाल बोरकर आणि अश्विनी राठी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
तिवसा तालुक्यातील जळका येथील पौराणिक खंडोबा मंदिर ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील समाधीस्थळापर्यंत जाणाऱ्या मुख्य 'दिंडी मार्गा'ची गेल्या १५ वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे गंभीर रुग्ण आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी तातडीने रस्ता नूतनीकरण आणि रुंदीकरण करण्याच्या मागणीसाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना निवेदन दिले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या मार्गावर केवळ तात्पुरते खड्डे बुजवण्याचे काम केले जाते, ज्यामुळे रस्त्याची स्थिती सुधारत नाही. हृदयविकार, कॅन्सर आणि गर्भवती महिलांना याच मार्गावरून अमरावती येथील 'अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल'मध्ये ने-आण केली जाते. मात्र, रस्त्यातील मोठ्या खड्ड्यांमुळे रुग्णांना रुग्णालयात पोहोचताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. निवेदन स्वीकारल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी यासंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच मागणीसाठी ९ ते १२ मार्च या कालावधीत माणिकग्राम धोत्रा येथे बेमुदत उपोषणही करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. या आंदोलनात प्रकाश चिचखेडे, अमोल वावरे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. जळका ते मोझरी हा मार्ग अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात किंवा वाहतूक कोंडी झाल्यास जड वाहनांसाठी एक महत्त्वाचा पर्यायी मार्ग म्हणून वापरला जातो. असे असूनही, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त या मार्गावरून १०० हून अधिक दिंड्या पायी प्रवास करतात, त्यामुळे वारकऱ्यांनाही या खड्ड्यांचा सामना करावा लागतो.
जायकवाडी धरणातील पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीसाठी समान चार आवर्तन दिले जातील. तसेच, पिण्याच्या पाण्यासाठी राखीव तरतूद करण्यात आली आहे. जायकवाडी धरणातील गाळ काढून केटी वेअर बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिली. पैठण येथील संतपीठात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खासदार डॉ. कल्याण काळे, राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, आमदार विजयसिंह पंडित, राजेश टोपे, अमरसिंह पंडित, रमेश बोरणारे, हिकमत उढाण, विलास भुमरे उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्री मेघना बोर्डीकर, आमदार नारायण कुचे, प्रकाश दादा सोळंके सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता अरुण नाईक, अधीक्षक अभियंता भरत शिंगाडे, निम्न दुधना प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती जगताप यांच्यासह बीड, परभणी, जालना जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. सिंचनासाठी जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यातून ज्याप्रमाणे चार आवर्तन दिले जातात, त्याचप्रमाणे उजव्या कालव्यातूनही चार आवर्तन देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यता दिली. याशिवाय, नांदूर मधमेश्वर कालव्यात उन्हाळी हंगामासाठी चार आवर्तन आणि निम्न दुधना प्रकल्पातून चार आवर्तन देण्यासही मंजुरी देण्यात आली. भविष्यातील सिंचन सुविधांच्या उपाययोजनांसाठी केटी वेअर बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. जायकवाडी धरणातील गाळ काढून पाण्याची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी राज्य स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी नांदूर मधमेश्वर कालव्याचे पाणी वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली. बीड, परभणी, जालना, संभाजीनगर येथील विविध मतदारसंघांतील लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या पाणी वाटपाच्या संदर्भात तसेच बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि त्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याबाबतच्या मागण्यांना बैठकीत मान्यता देण्यात आली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने कला शाखेतील बीए भाग दोनच्या अभ्यासक्रमातून 'ते पन्नास दिवस' ही कादंबरी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला स्थगिती देऊन कादंबरी पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनने (एआयएसएफ) केली आहे. या मागणीच्या पुष्ट्यर्थ एआयएसएफच्या राज्य सचिव प्रतीक्षा ढोके आणि इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे यांची भेट घेतली. त्यांनी डॉ. ढोरे यांना एक निवेदन सादर केले, ज्यात 'ते पन्नास दिवस' कादंबरी पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. पवन भगत यांनी लिहिलेली ही कादंबरी बीए भाग २ च्या चौथ्या सेमिस्टरच्या मराठी साहित्य मेजर-एक या विषयात समाविष्ट होती. या कादंबरीमध्ये कोरोना काळात सामान्य नागरिक आणि विशेषतः मजुरांची झालेली फरफट मांडण्यात आली आहे. एआयएसएफच्या मते, ही कादंबरी समाजाचे त्यावेळचे वास्तव चित्रण वाचकांसमोर उभे करते. त्यातून सामाजिक असमतोल, राज्यकर्त्यांची भूमिका आणि जबाबदारी स्पष्ट होते, ज्यामुळे विद्यार्थी अधिक परिपक्व व चिंतनशील बनतात. त्यामुळे ती रद्द करू नये, असे एआयएसएफने प्र-कुलगुरुंना सांगितले. काही व्यक्ती आणि संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ४ एप्रिल रोजी अधिसूचना क्रमांक ५२/२०२६ नुसार सदर कादंबरी अभ्यासक्रमातून वगळली. त्याऐवजी 'धग' ही दुसरी कादंबरी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. एआयएसएफने निदर्शनास आणले की, परीक्षा जवळ आली असताना इतक्या कमी कालावधीत नव्या कादंबरीचे अध्यापन विद्यापीठाच्या कोणत्याही महाविद्यालयात होणे शक्य नाही. यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे यांनी एआयएसएफने दिलेले निवेदन विद्या परिषदेकडे पाठविण्यात येईल, असे यावेळी सांगितले. दरम्यान, विद्यापीठाच्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार अध्यापनाचे दिवस ३ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होऊन १८ एप्रिलला संपणार आहेत, तर मे महिन्यात परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे ऐन परीक्षेपूर्वी अभ्यासक्रम बदलण्याच्या या निर्णयाबद्दल विद्वतजन आणि विद्यार्थीही बुचकळ्यात पडले आहेत.
अमरावती जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत तब्बल २० विभागांचा आढावा घेतला. कामात गुणवत्ता कायम ठेवा, नागरिकांना वेळेत सेवा द्या आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्यांच्या या मॅरेथॉन कामकाजामुळे जिल्हा परिषदेत सक्रियता दिसून येत आहे. गांधी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी मुख्यालयातील प्रत्येक विभागाची बारकाईने पाहणी केली. त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी त्यांनी एकेक करून सर्व २० विभागांचा आढावा घेतला. कामांची निर्धारित वेळेत पूर्तता होते आहे की नाही, जनतेला अपेक्षित सेवा मिळते आहे की नाही आणि बांधकाम व पाणीपुरवठा विभागांची कामे गुणवत्तापूर्ण आहेत की नाही, याची त्यांनी यावेळी चाचपणी केली. मंगळवारी दिवसभर सीईओंनी ११ विभागांचा आढावा घेतला. सकाळी १० वाजता सामान्य प्रशासन विभागाच्या बैठकीने आढाव्याला सुरुवात झाली. त्यानंतर प्रत्येक तासाला एक याप्रमाणे ग्रामपंचायत, वित्त, पाणीपुरवठा व स्वच्छता, प्राथमिक शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए), ग्रामीण पाणीपुरवठा, जलसंधारण आणि कृषी व पशुसंवर्धन विभागाचा आढावा उशिरा सायंकाळपर्यंत सुरू होता. बुधवारी दुसऱ्या दिवशी सीईओंनी जलसंधारण तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा उर्वरित आढावा घेतला. दुपारी १२ वाजता वाहन निर्लेखन विभागाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर काही बैठका अर्ध्या तासाच्या तर काही तासाभराच्या कालावधीत पार पडल्या. बांधकाम विभागाची बैठक सुमारे तासभर चालली. याव्यतिरिक्त लघुसिंचन, समाज कल्याण व दिव्यांग कल्याण, मनरेगा, ग्रामविकास व पंचायत राज, माध्यमिक व योजनांसाठी काम करणारा शिक्षण विभाग, एचव्हीपी लसीकरण मोहीम आणि कृषी विभागाचा उर्वरित आढावा घेण्यात आला. या सर्व बैठकांची सूचना सीईओंनी पदभार घेतल्याच्या पहिल्याच दिवशी सर्व विभागप्रमुखांना दिली होती. त्यामुळे प्रत्येक विभागप्रमुख आपली टिपणी व सहकाऱ्यांसह बैठकीला उपस्थित होते. सीईओंनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये त्यांच्याकडून त्या-त्या विभागाचे कामकाज जाणून घेतले. या आढावा बैठकांद्वारे सीईओ सत्यम गांधी यांनी केवळ विभागांचे कामकाज कसे चालले आहे, हेच जाणून घेतले नाही, तर प्रत्येक विभागप्रमुखाचा आवाका, त्यांचे अधिनस्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद तसेच संबंधित विभागप्रमुखाची प्रशासनावर किती पकड आहे, या मुद्द्यांचीही त्यांनी चाचपणी केली.
धारणी येथे महावितरणच्या एका सहायक अभियंत्याला ४ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. सुमारे ७० हजार रुपये मासिक वेतन असूनही त्याने सौर ऊर्जा कनेक्शनसाठी लाच मागितली होती. ही कारवाई बुधवारी सायंकाळी धारणी येथील महावितरण कार्यालयात करण्यात आली. सुशांत हरिदास बावनगडे (वय ४५, रा. धारणी) असे अटक करण्यात आलेल्या सहायक अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे सोलर पॅनल बसवण्याचा व्यवसाय करतात. ग्राहकांसाठी सोलर मीटर रिलीज ऑर्डर मिळवण्यासाठी त्यांना महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. तक्रारदारांनी मार्च महिन्यात चार ग्राहकांच्या घरी सोलर पॅनल बसवले होते. या चारही ग्राहकांच्या सोलर मीटर रिलीज ऑर्डर काढण्यासाठी त्यांनी महावितरण कार्यालयात अर्ज केला होता. ७ एप्रिल रोजी ते या संदर्भात चौकशी करण्यासाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी सहायक अभियंता सुशांत बावनगडे यांची भेट घेतली. बावनगडे यांनी तक्रारदाराला चार ग्राहकांच्या सोलर मीटर रिलीज ऑर्डर देण्यासाठी प्रत्येकी १ हजार रुपये याप्रमाणे एकूण ४ हजार रुपयांची लाच मागितली. या मागणीनंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, बावनगडे यांनी ४ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, आज सापळा रचण्यात आला. बावनगडे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडून अटक केली. त्यांच्याविरुद्ध धारणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक योगिता ठाकरे, चित्रा मेसरे, शैलेश कडू, आशिष जांभोळे आणि सतीश किटुकले यांच्या पथकाने केली. दरम्यान, अमरावती शहरातील साईनगर भागातही काही घरांवरील सौर ऊर्जा जोडणी पूर्ण झाली असून, त्यांना अद्याप मीटर रिलीज ऑर्डर मिळालेली नाही. ग्राहक आणि जोडणी करणारे व्यावसायिक दोन्ही बाजूंनी ऑर्डरची मागणी करत आहेत, परंतु विविध कारणे देत टाळाटाळ केली जात आहे. एका आमदाराचे स्वीय सहायक असलेल्या ग्राहकालाही अद्याप सोलर मीटर रिलीज ऑर्डर मिळालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मौजा चिंचोना येथील गट क्रमांक ३१२ मध्ये विद्युत तारांच्या घर्षणामुळे आग लागली. या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, काढणीस तयार असलेले गव्हाचे पीक आणि संत्रा बाग जळून खाक झाली आहे. भंडारज येथील युवा शेतकरी वैभव अशोक ठाकरे (वय २८) यांच्या दोन एकर शेतीत ही घटना घडली. त्यांनी संत्रा बागेत आंतरपीक म्हणून गव्हाचे पीक घेतले होते. आगीमुळे सुमारे एक एकरातील गहू पूर्णपणे जळून खाक झाला, तर सुमारे ३०० संत्रा झाडेही गंभीररीत्या बाधित झाली. विजेच्या लोंबकळणाऱ्या तारांमुळे हा अपघात घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या नुकसानीची भरपाई महावितरणकडून मिळावी, अशी मागणी पुढे आली आहे. घटनेनंतर शेतकरी ठाकरे यांनी भंडारज येथील महावितरण कार्यालयात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाखा अभियंता पवार यांनी तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. वैभव ठाकरे यांनी आमदार गजानन लवटे, उपविभागीय अभियंता तसेच तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जादू-टोणा आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचे एकामागून एक काळे कारनामे समोर येत आहेत. 'एसआयटी'च्या तपासात आता खरातचा एक अत्यंत धक्कादायक 'कांड' उघड झाला असून, तो आपल्याच श्रीमंत भक्तांना लुटण्यासाठी चक्क 'बोगस प्राप्तिकर (Income Tax) अधिकारी' पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, त्याच्या जाळ्यात अडकलेल्या आणखी ११ महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या राज्यात संतापाची लाट उसळली आहे. खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आतापर्यंत त्याच्यावर 13 गुन्हे दाखल झालेत. यातील 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे, 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे, तर एक गुन्हा ईडीने दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा आहे. त्यातच आता आपल्या श्रीमंत भक्तांना चित्रपट स्टाईलने लुबाडल्याचे समोर आले आहे. बनावट छापेमारी करून भक्तांना लुटायचा अशोक खरात केवळ भोंदूगिरीच करत नव्हता, तर त्याने लुटीचे जाळे सर्वत्र पसरवले होते. आपल्याकडे येणारे मोठे उद्योजक आणि व्यावसायिक भक्त हेरून तो त्यांच्याकडे बनावट प्राप्तिकर अधिकारी पाठवायचा. संबंधित भक्त मोठ्या संकटात सापडला आहे, असे भासवले जायचे आणि त्यानंतर प्राप्तिकर विभागाची कारवाई टाळण्यासाठी 'सेटलमेंट'च्या नावाखाली खरात त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचा. या 'बनावट रेड'मुळे अनेक उद्योजकांची मोठी फसवणूक झाली असून, आता हे भक्त पोलिसांत तक्रार करण्यासाठी पुढे येणार का, याकडे लक्ष लागले आहे. विकास दिवटे आत्महत्या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार सन २०२२ मध्ये शिर्डी संस्थानचे कर्मचारी विकास दिवटे यांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी खरातच्या अडचणी वाढणार आहेत. तत्कालीन पोलिस तपासात खरातचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले होते. मात्र, आता विकास दिवटे यांच्या भावाने पुन्हा तक्रार केल्यानंतर शिर्डी पोलिस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणाचा फेरतपास करण्यासाठी सरकारी वकिलांचा अभिप्राय मागवण्यात आला असून, लवकरच कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. तक्रारींचा आकडा १३ वर; एसआयटीकडून कसून चौकशी विशेष तपास पथकाने (SIT) खरातच्या कृत्यांचा पर्दाफाश करण्यासाठी स्थापन केलेल्या हेल्पलाईनवर तक्रारी येत आहेत. पती, मुले किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची भीती दाखवून महिलांना अघोरी कृत्यांच्या जाळ्यात ओढले जायचे. आता आणखी ११ पीडित महिलांनी धैर्याने पुढे येत खरातवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. खरातविरुद्ध आतापर्यंत एकूण १३ गुन्हे दाखल झाले आहेत. यात महिला अत्याचाराचे ८, तर फसवणुकीचे ४ गुन्हे आहेत. एसआयटी या सर्व तक्रारींची सखोल शहानिशा करत आहे. तपासादरम्यान खरातची १०० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असल्याचेही समोर आले असून, त्याचे आर्थिक व्यवहार एसआयटीच्या रडारवर आहेत.
गुजरातचे दिल्लीसमोर २११ धावांचे आव्हान
नवी दिल्ली : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएलमधील १४ वा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्णधार शुभमन गिल, जोस बटलर आणि वॉशिंग्टन सुंदरच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ बाद २१० धावा करत दिल्ली कॅपिटल्सच्या संघासमोर विक्रमी २११ धावांचे टार्गेट […] The post गुजरातचे दिल्लीसमोर २११ धावांचे आव्हान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात आरोग्य सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” या महत्त्वकांक्षी मोहिमेचे तळागाळापर्यंत व्यवस्थित नियोजन होऊन अंमलबजावणी व्हावी यासाठी गाव पातळीवरील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विभागीय कार्यशाळेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मंथन सभागृह, एमआयटी कॉलेज, बीड बायपास रोड, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सर्वसमावेशक व परिणामकारक करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. कार्यशाळेस विभागातील आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव रविंद्रन, सार्वजनिक आरोग्य विभाग आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहरी आरोग्य विभाग आयुक्त डॉ. सुनील भोकरे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर तसेच आरोग्य सेवा प्राथमिक संचालक डॉ. विजय कंदेवाड हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा, प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच “माझं गांव, आरोग्य संपन्न गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेत छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक परिमंडळातून एकूण-१३ जिल्ह्याचा समावेश असून जवळपास हजार अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.कांचन वानेरे, उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ, छत्रपती संभाजीनगर, डॉ.रेखा गायकवाड उपंसचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातुर तसेच डॉ कपिल आहेर उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ नाशिक यांच्यामार्फत करण्यात आले आहे. हे ही वाचा… क्रूरतेचा कळस:गर्भपातासाठी ‘पार्सल पाठवा’चा कोडवर्ड; भ्रूण नष्ट करण्याची जबाबदारी मातेवरच, गर्भपात रॅकेटचा मास्टरमाइंड डॉ. सुनील राजपूत शहरातील सातारा परिसरात उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंगनिदान आणि गर्भपात रॅकेटमध्ये अंगावर काटा आणणारे गौप्यस्फोट होत आहेत. या मृत्यूच्या खेळाचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) टीव्ही सेंटर भागात राहणारा डॉ. सुनील राजपूत असल्याचे तपासात पुढे आले आहे. तो मागील ७ ते ८ वर्षांपासून हे सिंडिकेट चालवत आहे. या प्रकरणात तो तुरुंगातून बाहेर आला की पुन्हा हाच प्रकार करायचा. सविस्तर वाचा…
मस्साजोगच्या सरपंचपदासाठी दिवंगत संतोष देशमुख यांची पत्नी अर्ज भरणार
बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला १ वर्षाचा कालावधी उलटला असून या प्रकरणातील आरोपी तुरुंगात आहेत. दुसरीकडे आता, येथील ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून मस्साजोगचा नवा सरपंच कोण याची उत्सुकता सर्वांनाच आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हेच गावचा कारभार हाती घेतील का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. […] The post मस्साजोगच्या सरपंचपदासाठी दिवंगत संतोष देशमुख यांची पत्नी अर्ज भरणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यभरात मोठ्या प्रमाणावर होत असलेले अवैध उत्खनन आणि नियमबाह्य स्टोन क्रशरवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने मोठा प्रशासकीय बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ५०० ते २००० ब्रासपर्यंतच्या खाणकामासाठी दिल्या जाणाऱ्या परवानग्यांचे अधिकार आता स्थानिक स्तरावर न ठेवता, ते थेट जिल्हाधिकारी स्तरावर सोपविण्यात येणार आहे. यासाठी नियमामध्ये बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत याबाबत लक्षवेधी मांडली होती. त्या अनुषंगाने मंत्रालयात महसूल मंत्र्यांच्या दालनात ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील विषयांच्या अनुषंगाने पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे कनिष्ठ स्तरावरील अधिकारी आणि खाण व्यावसायिक यांच्यातील गैरप्रकारांना चाप बसणार असून संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. या बैठकीला ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाल, पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड आणि रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्यासह महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र 'सेल' यापूर्वी कमी क्षमतेच्या (५०० ते २००० ब्रास) उत्खननासाठी तहसील किंवा प्रांत स्तरावर प्रक्रिया केली जात असे. मात्र, यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यावर तोडगा म्हणून महसूल मंत्र्यांनी आता हे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नियमात आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी एक स्वतंत्र 'सेल' (कक्षा) स्थापन करण्यात येईल, जो वर्षातून एकदाच अर्जांची छाननी करून रीतसर परवानगी देईल. दोषी अधिकाऱ्यांच्या वेतनवाढी रोखणार बैठकीत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला की, ज्या ठिकाणी कागदपत्रे नसतानाही खाणी सुरू ठेवण्यास मदत केली गेली आहे, अशा तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्या वेतनवाढी रोखण्याचे प्रस्ताव शासनाला सादर करावेत. शासन फसवणूक खपवून घेणार नाही, असेही त्यांनी बजावले. निसर्ग संपविणाऱ्यांची गय नाही या बैठकीत महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले की, खाणींना परवानगी न देणे हा उद्देश नसून, कायद्याचे पालन होणे महत्त्वाचे आहे. डोंगर फोडून निसर्गाची हानी करणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला परवानगी दिली जाणार नाही. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे पुणे प्रणालीचा विस्तार : पुण्यात यशस्वी ठरलेली डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली (Pune Model) आता ठाणे, पालघर आणि रायगडसह राज्यभर लागू केली जाईल. ईटीएस (ETS) सर्वेक्षण : सर्व ९० खाणींचे तात्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वेक्षणात उत्खननात तफावत आढळल्यास संबंधित मालकांवर कठोर दंड आणि फौजदारी कारवाई केली जाईल. रात्रीच्या उत्खननावर बंदी : रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने होणाऱ्या उत्खननामुळे सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष भरारी पथके तैनात करावीत.
सातारा शहरातील देगाव फाटा परिसरातील आशीर्वाद कॉलनी येथे राहणाऱ्या नागरिकांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ७० लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी दोन जणांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वेता सिंग आणि मुकुंद कोचर(पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही)अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रीम जर्नी क्लब या ग्रुपचे अॅडमिन श्वेता सिंग आणि मुकुंद कोचर यांनी सांगितल्या प्रमाणे फिर्यादी नितीन विष्णू निकम त्यांची बहीण इशा गजानन जाधव आणि पत्नी रूपाली नितीन निकम यांच्या बँक खात्यावरून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. जास्त नफा मिळेल असे सांगून त्यांनी फिर्यादीसह नातेवाईकांकडून ६ डिसेंबर २०२५ ते ९ जानेवारी २०२६ दरम्यान विविध बँक खात्यांद्वारे एकूण ७० लाख,८८ हजार रुपये घेतले. मात्र गुंतवणुकीवर कोणताही परतावा न देता संबंधितांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी श्वेता सिंग आणि मुकुंद कोचर या दोघांविरोधात सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे करत आहेत. साताऱ्यात वस्तीगृह चालकास धमकी; प्रवेशावरून वाद सातारा शहरात मुलींचे वस्तीगृह चालविणाऱ्या तक्रारदारास मुलीस ऍडमिशन का दिले अशी विचारणा करत शिवीगाळ व मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जमीर गणी सय्यद (वय ५० रा.मल्हारपेठ,सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात अनिल उर्फ पपु बडेकर(रा.ढोरगल्ली,मल्हारपेठ,सातारा)याच्या विरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुलींचे वस्तीगृह चालवित असून दि.६ फेब्रुवारी २०२५ ते ९ जानेवारी २०२६ दरम्यान अनिल बडेकर यांनी वस्तीगृहात येऊन कावेरी कदम (रा. सदरबझार, सातारा) हिला प्रवेश कसा दिला, असा जाब विचारला. तसेच संबंधित मुलगी सध्या कोठे आहे याबाबतही त्यांनी विचारणा केली. यावेळी वाद वाढत गेल्याने बडेकर यांनी सय्यद यांना शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणी अनिल बडेकर यांच्या विरोधात कलम ३५१(२)३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे करत आहे. दारू पिण्यासाठी कन्ट्रक्शन व्यवसायिकाला मारहाण करत जबरी चोरी सातारा शहरातील बसाप्पापेठ परिसरात एका कन्ट्रक्शन व्यवसायिकाला दारू पिण्यासाठी पैश्याची मागणी करून मारहाण करत जबरीने पैसे हिसकावून घेतल्याची घटना दि.७ रोजी घडली आहे. याप्रकरणी सोमनाथ शरद चोरगे (वय ४२,रा.रविवार पेठ सातारा) यांनी विक्रम उमेश कांबळे (वय २४,रा. रविवार पेठ भाजी मंडई) आणि अनोळखी तीन व्यक्तींविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा एसटी स्टँड समोर असलेल्या शेतकरी भाजी मंडई येथील पंजाब नॅशनल बँकेच्या समोर दुपारी साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान विक्रम कांबळे याने फिर्यादी चोरगे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने कांबळे याने चिडून फिर्यादीला दोन कानाखाली मारून त्याच्या शर्टच्या वरच्या खिशातील ११ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच शिवीगाळ करत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर दुपारी सुमारे १२.३० ते १२.४५ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी बसाप्पापेठ, सातारा येथे आला असता,संशयित आरोपीने त्याच्या सोबत असलेल्या तीन अनोळखी इसमांसह फिर्यादीला पुन्हा हाताने मारहाण केली. यावेळी आरोपीकडे सुरीसारखे शस्त्र असल्याचीही माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,या घटनेची तक्रार पोलिसांकडे नोंदविण्यात आली आहे.घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बागवान करत आहेत.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दल केलेल्या कथित अपमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी पुणे शहरातील स्वारगेट चौकात युवक काँग्रेसने तीव्र आंदोलन केले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यकर्त्यांनी संविधान बचाव आणि दलितांचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा दिल्या. यावेळी हिमंता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून प्रतीकात्मक 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले आणि त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. आंदोलनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने पोलीस प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप केला. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत आंदोलनात सहभागी झालेल्या युवक काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. युवक काँग्रेसने स्पष्ट केले की, हिमंता बिस्वा सरमा यांचे वक्तव्य केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून, संपूर्ण दलित समाजाच्या स्वाभिमानावर केलेला थेट हल्ला आहे. हे भाजप आणि संघाच्या मनुवादी व प्रतिगामी विचारसरणीचे उदाहरण असून, अशा वक्तव्यांमुळे समाजात द्वेष आणि विषमता पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांना बेकायदेशीरपणे राज्याबाहेर नेऊन अटक करण्याचा प्रयत्न हा लोकशाही मूल्यांवर गंभीर आघात असून, विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रकार असल्याचेही युवक काँग्रेसने नमूद केले. दलित समाजाचा अपमान आणि लोकशाहीविरोधी कृत्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशारा देत अशा घटनांविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे युवक काँग्रेसने म्हटले आहे. पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, देशातील सर्वात ज्येष्ठ दलित नेत्याबद्दल भाजपा मुख्यमंत्र्यांनी केलेली टिप्पणी ही भाजपची संस्कृती दर्शवते. मुख्य भ्रष्टाचाराच्या विषयाला बगल देऊन दुर्लक्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा सवाल त्यांनी केला. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश अबनावे, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे, प्रदेश महासचिव महेश म्हेत्रे, दिलीपसिंह देशमुख, भूषण रानभरे, प्रदेश सचिव निखिल मलके, विश्वजित जाधव, प्रदीप मेहकरे, अविनाश साळुंखे, अर्थव सोनार, पुणे शहर युवक काँग्रेसचे अभिजित चव्हाण, उपाध्यक्ष सद्दाम शेख, कुणाल काळे, पर्वती विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पुष्कर आबनावे, पुणे जिल्हा युवक काँग्रेस सचिव भूषण पाटोदकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोन ज्येष्ठ नागरिकांना ६० लाख रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर आणि अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत, कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर राहणाऱ्या ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ५४ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाली. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत संदेश पाठवला. त्यानंतर संपर्क साधून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवले. ज्येष्ठ नागरिकांनी चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले, मात्र त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसऱ्या एका प्रकरणात, कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी सहा लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. या संदर्भात ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक कदम या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुणे शहरात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. नुकताच मगरपट्टा सिटी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची १२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सायबर चोरटे अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत आहेत. दरम्यान, सायबर चोरट्यांनी एका तरुणाचा मोबाईल क्रमांक 'हॅक' करून त्याच्या बँक खात्यातून चार लाख ३९ हजार रुपये काढून घेतल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. या तरुणाने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला होता. चोरट्यांनी मोबाईलचा तांत्रिक ताबा घेऊन खात्यातून रक्कम दुसऱ्या खात्यात वळवली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पुणे महानगरपालिकेत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कडून होणाऱ्या गॅस पुरवठ्याबाबत महापौर मंजुषा नागपुरे यांनी नुकतीच एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शहरात गॅस पाइपलाइन विस्ताराला गती देण्याचे आणि सर्व भागांपर्यंत ही सेवा पोहोचवण्याचे निर्देश दिले. महापौरांनी विशेषतः ज्या भागांमध्ये अद्याप गॅस सेवा पोहोचलेली नाही, त्या भागांना प्राधान्याने जोडण्याच्या सूचना दिल्या. तसेच, सुरू असलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देत नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने सोडवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी महापौर नागपुरे यांनी स्पष्ट केले की, शहरातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, अखंड आणि सुलभ गॅसपुरवठा मिळावा, ही महानगरपालिकेची प्राथमिकता आहे. एमएनजीएल संदर्भात ही महत्त्वाची आढावा बैठक मंगळवारी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरातील सुरू असलेल्या गॅस पाइपलाइन कामांसह प्रस्तावित प्रकल्पांचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस एमएनजीएलचे वरिष्ठ अधिकारी, तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी एमएनजीएलकडून शहरातील विविध भागांतील कामांची सद्य:स्थिती, गॅस पाइपलाइनचे कव्हरेज आणि भविष्यातील विस्तार आराखडा याची माहिती सादर करण्यात आली. महापौर नागपुरे यांनी एमएनजीएल आणि महानगरपालिका यांच्यात समन्वय साधून पुढील कामे गतीने राबवली जातील असे सांगितले. पासपोर्ट सेवा केंद्रामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक व नागरी समस्यांवर पूर्वतयारी पुणे, बाणेर–पाषाण लिंक रोड येथे नव्याने सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे निर्माण होत असलेल्या वाहतूक कोंडी, पार्किंग, अतिक्रमण व परिसर वाहतूक व्यवस्थापनाच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने आज औंध क्षेत्रीय कार्यालय येथे संयुक्त समन्वय बैठक पार पडली. या बैठकीस औंध क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी विजय नायकल, पासपोर्ट कार्यालयाचे प्रतिनिधी जतिन कोटे, माजी उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका रोहिणी चिमटे, राहुल कोकाटे, बाणेर–पाषाण लिंक रोड परिसरातील नागरिक, तसेच पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यानंतर परिसरात उद्भवलेल्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, रस्त्यावरील अतिक्रमणे, पादचारी सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा आदी मुद्दयावर ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली, यात प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या समन्वयातून नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
कर्करोगावर अधिक परिणामकारक आणि कमी दुष्परिणाम असलेले उपचार विकसित करण्याच्या दिशेने बीव्हीजी लाइफ सायन्सेस लिमिटेडने महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. 'संयुग ७' या नव्या फायटो-औषध आधारित संयुगाने कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात आशादायक परिणाम दर्शवले आहेत. जनुकशास्त्र आणि अचूक उपचारपद्धती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ, येल विद्यापीठाचे (अमेरिका) प्राध्यापक डॉ. श्रीकांत माने यांनी या संयुगाच्या कार्यक्षमतेबाबत माहिती दिली. डॉ. माने पुण्यातील यशदा येथे आयोजित कर्करोग विषयक विशेष शास्त्रीय कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम बीव्हीजी लाइफ सायन्सेस लिमिटेड आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास बीव्हीजी समूहाचे संस्थापक हणमंतराव गायकवाड, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, बीव्हीजी लाइफ सायन्सेसच्या संचालिका डॉ. जयश्री द्रविड यांच्यासह प्रख्यात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. विनय थोरात, युरोलॉजिस्ट डॉ. सुरेश पाटणकर आणि विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे विभागप्रमुख उपस्थित होते. साताऱ्याहून डॉ. प्रतापराव गोळे हे खास या कार्यक्रमासाठी आले होते. एकूण २५० डॉक्टरांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. डॉ. माने यांनी सांगितले की, 'संयुग ७' कर्करोग पेशींची वाढ थांबवते, त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवते आणि त्यांचा शरीरातील इतर भागांमध्ये प्रसार (मेटास्टेसिस) होण्यास प्रतिबंध करते. तसेच, हे संयुग शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकटी देत कर्करोगविरोधी लढा अधिक प्रभावी बनवते. प्राथमिक निष्कर्षांनुसार, हे संयुग कर्करोग पेशींवर प्रभावीपणे परिणाम करते, तर सामान्य पेशींवर त्याचा अत्यल्प किंवा नगण्य परिणाम आढळतो. या संशोधनातून 'संयुग ७' कर्करोगाच्या वाढीशी संबंधित विविध जैविक प्रक्रियांवर प्रभाव टाकत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुरक्षित, लक्ष्यित आणि अधिक प्रभावी उपचार विकसित करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरू शकते, असे डॉ. माने यांनी नमूद केले. बीव्हीजी समूहाचे संस्थापक हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले की, बीव्हीजी लाइफ सायन्सेस गेल्या दशकभरापासून फायटो-औषध संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे. सातत्यपूर्ण प्रयत्नांतून कर्करोगासह इतर अनेक आजारांवर प्रभावी औषधे विकसित करण्यात यश मिळाले आहे. या संशोधनामुळे देशातील कर्करोग रुग्णांना नवी आशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परभणीहून पुस्तके घेऊन येताना शिक्षकाचा अपघाती मृत्यू
परभणी : परभणीहून गावाकडे परत येत असताना चारचाकी वाहनाच्या धडकेत खासगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक ज्ञानोबा सोपानराव कच्छवे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान परभणी-गंगाखेड महामार्गावर तरोडा परिसरात घडली. यामुळे दैठणा गावावर शोककळा पसरली आहे. शिक्षक ज्ञानोबा कच्छवे हे काही कामानिमित्त मंगळवारी स्वत:च्या दुचाकी(एमएच २२ एके ७०५०) […] The post परभणीहून पुस्तके घेऊन येताना शिक्षकाचा अपघाती मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एमपीएससी परीक्षेत सोलापूरचा डंका
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२४ चा अंतिम निकाल बुधवार दि. ८ एप्रिल रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लामकाने हे सर्वसाधारण तथा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम, तर सोलापूर जिल्ह्यातीलच आरती परमेश्वर जाधव या महिलांमधून राज्यात प्रथम आल्या आहेत. सदर परीक्षा दि. २७ ते २९ […] The post एमपीएससी परीक्षेत सोलापूरचा डंका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बनावट जात प्रमाणपत्रांच्या आधारे अनुसूचित जमातीच्या कोट्यातून विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याप्रकरणी आरोपी प्राध्यापकांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. पुरावा नष्ट करण्याच्या शक्यतेमुळे जिल्हा न्यायाधीश जे. सी. यादव यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणी पाचगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस दक्षता पथकाच्या पोलीस निरीक्षक गोपीका कोडापे यांनी २८ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सालई गोधनी येथील प्राध्यापक अमोल देविदास घोडे, सहायक प्राध्यापक मोहन ज्ञानेश्वर करंभे आणि शुभम बालाजी खोरगडे यांच्यासह काही विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा यात समावेश आहे. सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, विद्यार्थ्यांनी नव्हे तर प्राध्यापकांनीच विद्यार्थ्यांना बनावट जात प्रमाणपत्रे तयार करून दिली. आरोपींना जामीन दिल्यास ते पुरावा नष्ट करू शकतात किंवा पुराव्याशी छेडछाड करू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आरोपींकडून अॅड. मनोज मेंढे आणि रिया जिकार यांनी बाजू मांडली. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि फार्मसीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ३२ विद्यार्थ्यांनी विविध दलालांना पैसे देऊन बनावट जात प्रमाणपत्रे बनवून घेतल्याचे समोर आले आहे. या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे त्यांनी अनुसूचित जमातीच्या कोट्यातून सालई गोधनी येथील गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळवला होता. भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेस (TRTI) अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांची जमात वैधता प्रमाणपत्रे उपलब्ध करून दिली होती. त्यापैकी ३२ उमेदवारांची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे TRTI ने CET सेलला कळवले. त्यानंतर CET सेलने संबंधित संस्था आणि विद्यार्थ्यांना सात दिवसांच्या आत खुलासा करण्याचे निर्देश दिले होते.
मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मानखुर्द येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथे सरकारी जमिनीवर असलेल्या अनधिकृत तब्बल बाराशे झोपड्यांवर पालिकेचा हातोडा पडला आहे. या निष्कासित जागेवर आता नागरिकांसाठी 'विज्ञान पार्क ' उभारण्यात येणार आहे. मुंबईला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला असून त्यातून देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने पडताळणी करून सरकारी जमिनी ताब्यात घेतल्या पाहिजेत, असे उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. मानखुर्द येथील शासकीय जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमणाबाबत, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामाचे निष्कासन करण्यात आले. पोलिस उपायुक्त समीर शेख, अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) पूर्व उपनगरे पद्माकर रोकडे यांच्यासह पूर्व उपनगरातील अतिक्रमण निष्कासन विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकऱ्यांसह ४०० कर्मचाऱ्यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. ११ एकर शासकीय जमीन मोकळी या मोहिमेद्वारे आतापर्यंत १२०० हून अधिक झोपड्यांचे निष्कासन करण्यात आले असून, ११ एकर शासकीय जमीन मोकळी करण्यात आली आहे. मोकळ्या केलेल्या जागेवर परत अतिक्रमण होऊ नये या करिता संरक्षक भिंत बांधण्यात येत असून, अतिक्रमण होणार नाही याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. सरकारी जमिनी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील - लोढा मुंबई महापालिकेच्या उपनगर अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागाने केलेल्या कारवाईबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुंबईला अधिक सुरक्षित, सुविधाजनक आणि सुंदर करण्याचा संकल्प केला आहे. या अनुषंगाने सह पालकमंत्री या नात्याने कब्जा केलेल्या सरकारी जमिनी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले. मालाड आणि मालवणी परिसरातही कारवाई सुरू - लोढा मुंबई परिसरात गेल्या काही वर्षांपासून भूमाफियांनी सरकारी जमिनींवर अनधिकृत बांधकामे करून मोकळ्या जागा हडप करण्याचा उद्योग सुरु केला असल्याचे शासनाच्या निदर्शनाला आले आहे. त्यातूनच अनेकदा बांगलादेशी आणि रोहिंग्यांना ही स्थानिक नेत्यांच्या मदतीने संरक्षण मिळत असल्याचे चित्र आहे. अशा परिसरात मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थांचा गोरखधंदा तसेच समाजविघातक कृत्याला खतपाणी मिळत असते. मालाड आणि मालवणी परिसरातही सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे निदर्शनाला आली असून तिथे ही अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कडक कारवाई सुरु असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली. अतिक्रमणमुक्त जमिनीवर विधायक उपक्रम राबवणार मुंबई आणि उपनगर मिळून हजारो एकर सरकारी जमिनीवर अनधिकृत बांधकामे असल्याचे शासनाच्या निदर्शनाला आले आहे. या सर्व जमिनींवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करून पुन्हा त्या जमिनी सरकारच्या ताब्यात आणण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी निवडक अतिक्रमण मुक्त ५०० एकर जमिनीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात विधायक उपक्रम राबवणार आहोत, असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. मानखुर्द येथील सध्या अतिक्रमण मुक्त करण्यात आलेल्या जमिनीवर नागरिकांसाठी सेवाभावी संस्थांच्या मदतीने अत्याधुनिक 'विज्ञान पार्क' उभारणार असल्याचेही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई उपनगरातील अनधिकृत बांधकामाच्या विरोधातील कारवाई अधिक कडक करण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असून, काँग्रेसने माघार न घेण्याची ठाम भूमिका घेतल्यामुळे आता या मतदारसंघात निवडणूक होणे जवळपास निश्चित झाले आहे. या राजकीय घडामोडींदरम्यान, आज बारामतीमधून 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातूनही 4 उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली असून, उद्या शेवटच्या दिवशी माघारीच्या सत्रात आणखी काय नाट्य घडते, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, आज दिवसभरात 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. सायंकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक कार्यालयाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याने आजची अंतिम आकडेवारी स्पष्ट होण्यास काहीसा वेळ लागणार आहे. सुरुवातीला 53 वैध अर्जांपैकी सहा जणांनी माघार घेतल्याने सध्या तरी 47 उमेदवार रिंगणात उरले आहेत. मात्र उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बारामतीत मोठ्या राजकीय हालचाली होण्याची आणि चित्र बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कॉंग्रेस ठाम या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना अधिकृत उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले असून, काँग्रेसने आतापासूनच निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातही काही उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 18 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. बारामतीत काँग्रेसने माघार न घेण्याचा पवित्रा घेतल्याने येथील लढत तिरंगी किंवा चुरशीची होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून चौघांची माघार दरम्यान, अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दुसऱ्या दिवशी चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, आता 18 उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. उद्या गुरुवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता असून, महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेले दोन अपक्ष अर्ज आणि शिवसेना ठाकरे सेनेचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांच्या उमेदवारीबाबत नेमका काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात प्रामुख्याने भाजप-महायुतीचे अक्षय कर्डिले आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे गोविंदराव मोकाटे यांच्यातच थेट लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
बांधकाम करताना उत्खनन करण्यात आलेले गौण खनिज त्याच जागी वापरले तर त्याला रॉयल्टी माफ करण्यात आली असून, बिनशेतीसाठी आता जिल्हाधिकारी यांच्याकडे जाण्याची आवश्यकता नसून ही प्रक्रिया दहा दिवसात ऑनलाईन करण्यात येणार आहे. याबरोबरच महापालिका आणि मिळकतपत्रावरील नोंदीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. राज्यभरातील बांधकाम व्यावसायिकांना भेडसावणारे प्रश्न आणि प्रलंबित मागण्यांबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात क्रेडाईच्या (CREDAI) प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बांधकाम करताना होणाऱ्या खोदकामासाठी आकारल्या जाणाऱ्या रॉयल्टीबाबत क्रेडाईने मांडलेले प्रश्न महसूलमंत्र्यांनी मार्गी लावले आहेत. सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, उत्खननानंतर निघालेले गौणखनिज जर त्याच बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी वापरले जात असेल, तर त्यावर कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही. यामुळे प्रकल्पाचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, रॉयल्टी भरण्याची प्रक्रिया आता अधिक सुटसुटीत करून ती सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिनशेतीची डिजिटल प्रक्रिया आता १० दिवसांत बिगरशेती (NA) परवान्यासाठी लागणारा वेळ व क्लिष्ट प्रक्रिया कमी करण्यासाठी महसूल विभागाने कालबद्ध कार्यक्रम आखला आहे. एनएची संपूर्ण पद्धत येत्या दहा दिवसांत पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. यामुळे गृहप्रकल्पांच्या कामात येणारे प्रशासकीय अडथळे दूर होतील. पुणे पॅटर्नचा राज्यभर विचार; डिजिटल ट्रेकिंगवर भर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी राबवलेली 'डिजिटल ट्रेकिंग प्रणाली' यशस्वी ठरली आहे. हीच पारदर्शक प्रणाली आता राज्यभर राबवण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. याशिवाय, कोणत्याही कागदपत्राचे रजिस्ट्रेशन (नोंदणी) झाल्यास त्याची नोंद तातडीने मिळकत पत्रिकेवर (Property Card) झालीच पाहिजे, ही क्रेडाईची मागणीही मंत्र्यांनी तत्वतः मान्य केली आहे. या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. याचाच भाग म्हणून मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे आणि जमाबंदी आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्यासोबत स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात आले असून, तांत्रिक बाबी लवकरात लवकर सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास क्रेडाईकडून व्यक्त करण्यात आला.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवड झालेल्या प्रिया शिंदे यांच्या कुणबी (ओबीसी) प्रमाणपत्रावर आक्षेप घेत कायदेशीर आव्हान दिल्याने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. संतोष साळुंखे व जयदीप मगर यांनी एडवोकेट दत्तात्रय घोडके यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून, जात पडताळणी प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तक्रारदारांच्या मते, ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेले कुणबी प्रमाणपत्र अत्यंत अल्प कालावधीत देण्यात आले. या प्रक्रियेत संबंधित महसूल यंत्रणेने नियमांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हे प्रकरण सध्या जिल्हा जात पडताळणी समितीकडे प्रलंबित असतानाच या प्रमाणपत्राला मान्यता देणे चुकीचे ठरेल, अशी ठाम भूमिका तक्रारदारांनी घेतली आहे. यामुळे प्रश्न केवळ प्रमाणपत्राच्या वैधतेपुरता राहत नाही, तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवले जात आहे. “जलदगतीने प्रमाणपत्र देणे म्हणजे नियमबाह्य निर्णयाला वैधतेचा मुलामा देणे का?” असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, 20 मार्च रोजी झालेल्या निवडीत प्रियाताई शिंदे अध्यक्षपदी, तर राजू भोसले उपाध्यक्षपदी विराजमान झाले. मात्र या निवडीदरम्यान भारतीय जनता पक्षाने राजकीय डावपेचांचा वापर केल्याच्या चर्चा आधीपासूनच रंगत होत्या. आता त्यात कायदेशीर वादाची भर पडल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, हा वाद पुढे दोन पातळ्यांवर परिणाम करू शकतो. एक म्हणजे, जात पडताळणी समितीने प्रमाणपत्र अमान्य केल्यास अध्यक्षपदावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. आणि दुसरे म्हणजे, या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेमधील सत्तासंतुलन पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता आहे. एकीकडे भाजपवर “दबावतंत्र” वापरल्याचे आरोप होत असताना, दुसरीकडे विरोधकांना या प्रकरणातून राजकीय संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा वाद केवळ कायदेशीर चौकटीत न राहता आगामी स्थानिक राजकारणाचा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. आता सर्वांची नजर जात पडताळणी समितीच्या निर्णयाकडे लागली आहे. तोपर्यंत, प्रिया शिंदे यांचे अध्यक्षपद हे राजकीयदृष्ट्या ‘स्थिर’ असले तरी कायदेशीरदृष्ट्या ‘अस्थिर’ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे ही वाचा… समरजीत घाटगे पुन्हा भाजपमध्ये:शशिकांत शिंदेंचा हसन मुश्रीफांना इशारा; सतेज पाटलांचीही टीका, 2029 साठी नवा गेमप्लॅन कोल्हापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना म्हणजे समरजीत घाटगे यांची भाजपमध्ये झालेली घरवापसी. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले घाटगे आता पुन्हा ‘कमळ’ हाती घेतल्याने राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत आहेत. मुंबईतील भाजप मुख्यालयात मंत्री चंद्रकांत पाटील आणि रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृत प्रवेश केला. या निर्णयापूर्वी आपण शरद पवारांना सांगूनच पाऊल उचलल्याचेही घाटगे यांनी स्पष्ट केले होते. सविस्तर वाचा…
युद्धविरामानंतरही इराणच्या तेल रिफायनरीवर हल्ला
तेहरान : इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच एक हल्ला झाला आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, आज इराणच्या लव्हान बेटावरील एका तेल शुद्धीकरण प्रकल्पाला (रिफायनरीला) लक्ष्य करण्यात आले. स्थानिक वेळेनुसार, सकाळी १०:०० च्या सुमारास हा हल्ला झाला आणि त्यानंतर रिफायनरीमध्ये आग भडकली. दरम्यान, कुवेतनेही असा दावा केला आहे की, युद्धविराम लागू असूनही, इराणच्या बाजूने ड्रोन हल्ला […] The post युद्धविरामानंतरही इराणच्या तेल रिफायनरीवर हल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धाराशिवमध्ये गॅस स्टॉक आणि वितरण व्यवस्थेत मोठी तफावत आढळल्याने निर्माण झालेल्या तणावातून ज्ञानेश्वर माळी या गॅस वितरकाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कंपनीच्या तपासणीनंतर समोर आलेल्या 1200 सिलेंडरच्या घोळासह सुमारे सात लाख रुपये किमतीच्या सिलेंडरची बेकायदेशीररीत्या विक्री केल्याच्या चर्चेमुळे माळी प्रचंड मानसिक दडपणाखाली होते. सद्यस्थितीत त्यांच्यावर सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांनी हाती घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील गॅस वितरक ज्ञानेश्वर माळी यांनी कंपनीच्या तपासणीत साठा आणि वितरण यामध्ये मोठी तफावत आढळल्याने निर्माण झालेल्या मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केला. गेल्या अनेक दिवसांपासून या वितरकाकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने गॅस कंपनीने त्यांचा पुरवठाही बंद केला होता, ज्यामुळे ते प्रचंड दडपणाखाली होते अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे धाराशिव जिल्ह्यात गॅस टंचाईची गंभीर समस्या जाणवत असतानाच, गॅस कंपनीच्या बैठकीत डीलरने हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तामलवाडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा नेमका उलगडा करण्यासाठी त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. नागपूरमध्ये संतप्त नागरिकांनी सिलिंडर पळवून नेले नागपूरच्या जरीपटका परिसरात गॅस सिलिंडर वितरणास होणाऱ्या विलंबामुळे संतापलेल्या नागरिकांनी चक्क सिलिंडर पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बराच वेळ रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त जमावाने हे टोकाचे पाऊल उचलले होते. मात्र माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणि समजुतीनंतर नागरिकांनी पळवून नेलेले सिलिंडर पुन्हा एजन्सीकडे सुपूर्द केले असून, या गोंधळामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बीडमध्ये गॅस एजन्सी बाहेर रांगा बीड जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक त्रस्त झाले असून, गेवराईसारख्या ग्रामीण भागात गॅस एजन्सी उघडण्यापूर्वीच ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. गॅस सिलिंडरचा सर्रास होणारा काळाबाजार आणि ग्राहकांचे ओटीपी परस्पर मिळवून केल्या जाणाऱ्या अवैध विक्रीमुळे ही कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रकारांची दखल घेऊन गॅस वितरणाचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दिवाळीपूर्वी मध्य प्रदेशात यूसीसी?
भोपाळ : डॉ. मोहन यादव सरकार मध्य प्रदेशमध्ये समान नागरिक संहिता (यूसीसी) लागू करण्याच्या तयारीत आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी मंत्र्यांना सांगितले की यूसीसीचा अभ्यास करा, ते राज्यात लागू करायचे आहे. या संकेतानंतर गृह विभागात प्रक्रिया वेगवान झाली आहे, कारण यूसीसी विधेयक तयार करण्याची जबाबदारी याच विभागाची आहे. सूत्रांनुसार, लवकरच […] The post दिवाळीपूर्वी मध्य प्रदेशात यूसीसी? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे पोलिसांनी शहरातील अमली पदार्थांच्या वाढत्या सेवनाला आळा घालण्यासाठी 'नो ड्रग्स व्हॉलेंटिअर' मोहिमेला गती दिली आहे. या मोहिमेत युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आझम कॅम्पस येथील असेंब्ली हॉलमध्ये आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. 'नशामुक्त तरुणाई पुणे पोलिस स्वयंसेवक' मोहिमेअंतर्गत हा कार्यक्रम पुणे पोलिस, लष्कर पोलिस ठाणे, डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी, अवामी महज आणि पद्मपाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या कार्यक्रमात सुमारे २०० ते २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, विशेष शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकर, परिमंडळ ५ चे उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त राजलक्ष्मी शिवणकर, तसेच लष्कर विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता अल्फान्सो, संतोष खेतमाळस उपस्थित होते. एम.सी.ई. सोसायटीच्या अध्यक्षा अबेदा इनामदार, ट्रस्टी आय.पी. इनामदार, पद्मपाणी फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल डंबाळे आणि डॉ. पी.ए. इनामदार विद्यापीठाचे पदाधिकारी व शिक्षकही उपस्थित होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थांचे वाढते सेवन ही पुणे शहरातील गंभीर समस्या असल्याचे नमूद केले. पोलिसांनी यापूर्वी अनेक कारवाया केल्या असल्या तरी जनजागृती अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी युवकांना व्यसनाचे दुष्परिणाम आणि त्यातून होणारे कौटुंबिक नुकसान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 'नो ड्रग्स व्हॉलेंटिअर' मोहिमेद्वारे शहरातील एक लाख विद्यार्थ्यांना जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही मोहीम शाळा व महाविद्यालयांमध्येही राबविण्यात येणार असून, युवकांनी स्वयंसेवक म्हणून पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात ड्रग्स शोध पथकाचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.
आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या उच्चशिक्षित मुलींवर नियोजनबद्धपणे लैंगिक अत्याचार होत असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. सध्या 'लव्ह जिहाद' सारखाच 'कॉर्पोरेट जिहाद' समोर आला आहे. त्यात आयटी कंपन्यांत कार्यरत असणाऱ्या उच्चशिक्षित मुलींना लक्ष्य करून त्यांच्यावर नियोजनबद्धपणे लैंगिक अत्याचार होत आहे. त्यामुळे मुलींनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, असे ते म्हणालेत. गोपीचंद पडळकर यांनी आज पुण्यात एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यात त्यांनी उपरोक्त खबळजनक आरोप केला. ते म्हणाले, नाशिक हे आयटी हब नसले तरी तिथे काही आयटी कंपन्या आहेत. पुणे हे मोठे आयटी हब आहे. आयटी कंपन्यांमध्ये काही गैरप्रकार घडत असल्यास संबंधित कंपनी अधिकाऱ्यांनी त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. नाशिक येथील एका कंपनीत एका तरुणाचा धर्मांतराचा प्रकारही समोर आला आहे. नाशिकच्या कंपनीचे दिले उदाहरण नाशिकमधील एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत मुलींना लक्ष्य करून त्यांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचा दावाही पडळकर यांनी यावेळी केला. ते म्हणाले, सदर कंपनीत १३० कर्मचारी काम करतात. लैंगिक अत्याचारामुळे अनेक मुलींनी नोकऱ्या सोडल्या. पण त्यातील नऊ पीडित मुलींनी धाडस दाखवून पुढे येत पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मागील दोन ते तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असून हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. टीम लीडर्सना मुलींना जाळ्यात अडकवण्याचा टास्क राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने भोंदू अशोक खरात प्रकरण बाहेर आले. त्यानंतर नाशिक पोलिसांनी आणखी एक प्रकरण शोधून काढले आहे. सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) नेमली आहे. कॉर्पोरेट कंपनीच्या संदर्भात टीम लीडर्सना टास्क ठरवून दिला जात असे. ते मुलींची मुलाखत घेऊन नोकरीसाठी शिफारस करत आणि त्यानंतर त्यांच्यावर दबाव टाकत. नोकरी कोणी लावली हे सांगणे, सुट्टी देण्यासाठी दबाव टाकणे, तसेच विविध रिसॉर्टमध्ये सुट्टीच्या दिवशी फिरावयास घेऊन जाणे असे प्रकार घडत होते. इमॅजिका येथे कंपनीतील मुलींना फिरण्यास घेऊन जाण्याच्या बहाण्याने एका तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर तिघांनी नियोजनबद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपींवर मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
अशोक खरातच्या अश्लील व्हीडीओंची १५ ते २० रुपयांमध्ये विक्री
नाशिक : प्रतिनिधी भोंदू अशोक खरात आणि महिलांचे आक्षेपार्ह व्हीडीओ सोशल मीडियातून हटवण्यात येत आहेत. एसआयटीच्या सायबर टीमने तब्बल चार हजारपेक्षा अधिक लिंक्स सोशल मीडियावरून डिलिट केल्या आहेत. मात्र, त्यापूर्वी या अशोक खरात पीडित महिलांच्या आक्षेपार्ह व्हीडीओची विक्री अवघ्या १५ ते २० रुपयांमध्ये केली जात असल्याचे उघड झाले आहे. १५ ते १७ अश्लील व्हीडीओ फेसबुक, […] The post अशोक खरातच्या अश्लील व्हीडीओंची १५ ते २० रुपयांमध्ये विक्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उमरदरी शिवारात तरुणाचा मृतदेह आढळला:अंगावरील जखमांमुळे खून झाल्याचे स्पष्ट, ओळख पटविण्याचे काम सुरू
सेनगाव तालुक्यातील उमरदरी शेत शिवारात असलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह बुधवारी ता ८ सकाळी आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सेनगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली. तरुणाच्या अंगावरील जखमा व चेहऱ्यावरील दगडाचे वार लक्षात घेता त्यांचा खून झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील उमरदरी फाट्याजवळ एक अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाची वय सुमारे पंचवीस वर्षे असून त्याच्या उजव्या हातावर सचिता व एक पाऊल गोंदलेले (टॅटू )काढला असून तर दुसऱ्या हातावर मॉम डॅड व आई वडील लहान मुलाचा हात धरलेला असे छायाचित्र (टॅटू) काढलेले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी योग्य त्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या. सदर तरुणाचा मृतदेह कुणाचा आहे निष्पन्न होईपर्यंत मृतदेह हिंगोली येथील शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. मृतदेहाच्या अंगावरील जखमांमुळे तसेच दगडाने डोक्यावर वार केल्याचे दिसून आल्याने सदर व्यक्तीचा खून झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक नागनाथ पाटील,जमादार जीवन मस्के, सुभाष चव्हाण, ओमनाथ राठोड,अमोल चिकने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणे केली आहे. मयताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत
नाशिक शहरात एकीकडे अशोक खरात प्रकरणाची चर्चा गरम असतानाच, आता कॉर्पोरेट जगताची मान शरमेने खाली घालायला लावणारा एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी (IT) कंपनीत कामाला असलेल्या १८ ते २५ वयोगटातील तरुणींचे लैंगिक आणि मानसिक शोषण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात आतापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी ६ आरोपींविरुद्ध कारवाई करत ५ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीतील टीम मॅनेजर आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हा किळसवाणा प्रकार केला. करिअरमध्ये अडथळे आणण्याची किंवा नोकरीवरून काढून टाकण्याची भीती दाखवून या तरुणींना जाळ्यात ओढले जात होते. कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी असलेले नियम पायदळी तुडवत या तरुणींचा विनयभंग आणि मानसिक छळ करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये पीडितांच्या धार्मिक भावना दुखावल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तपासासाठी 'एसआयटी'ची स्थापना या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता, नाशिक पोलिस आयुक्तांनी तातडीने संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या शोषणाचे बळी ठरलेल्या मुलींची संख्या २० ते २५ च्या घरात असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी एकूण ६ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यात ५ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी ५ पुरुषांना अटक केली असून, एक महिला आरोपी अद्याप फरार आहे. अटक केलेल्या पाचही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. कॉर्पोरेट संस्कृतीवर प्रश्नचिन्ह नाशिकसारख्या प्रगत शहरात आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आयटी हबमध्ये असा प्रकार घडल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले का? यामध्ये आणखी कोणा बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का? याचा तपास आता 'एसआयटी' करत आहे. न घाबरता पुढे या: पोलिसांचे आवाहन नाशिक पोलिसांनी पीडित तरुणींना धीर देत आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या छळाला ज्या मुली बळी पडल्या असतील त्यांनी संकोच न बाळगता तक्रार करण्यासाठी पुढे यावे. तक्रारदार तरुणींची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हे ही वाचा… भोंदूबाबा अशोक खरातला कोर्टाचा दणका; न्यायालयीन कोठडी:उद्या पुन्हा हजेरीचे आदेश; SIT पुन्हा ताबा घेणार, तपासाला वेग नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणात आरोपी अशोक खरात याच्याविरोधातील कारवाई अधिक तीव्र होताना दिसत आहे. आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. यासोबतच आरोपीला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सविस्तर वाचा…
डिजिटल जखमा कायमस्वरूपी राहतात
नवी दिल्ली : डिजिटल युगात तुमची गोपनीयता धोक्यात आली असेल, तर आता न्यायालय तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने एका प्रकरणात डिजिटल जखमा हा महत्त्वाचा शब्दप्रयोग करत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या मनमानी कारभारावर ओढलेले ताशेरे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. डिजिटल युगात मानवी जीवन अधिक सुलभ, अधिक वेगवान आणि अधिक खुले झाले आहे. मात्र […] The post डिजिटल जखमा कायमस्वरूपी राहतात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात शनिवारपासून‘पटपडताळणी’
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची अचूक नोंद आणि उपस्थितीची खात्री करण्यासाठी शिक्षण विभागाने ‘पटपडताळणी’ मोहिमेला वेग दिला असून ११, १५ आणि २२ एप्रिल २०२६ या तीन टप्प्यांत ही प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे बनावट विद्यार्थी व शाळा शोधण्यासाठी शिक्षण संचालनालयाने पुन्हा एकदा निर्णय घेतला असून यामध्ये इयत्ता दुसरी ते नववी आणि अकरावीच्या […] The post राज्यात शनिवारपासून‘पटपडताळणी’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चेक बाऊन्स तक्रार खटल्यापूर्वीच्या टप्प्यावर रद्द करता येत नाही
नवी दिल्ली : नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टच्या (कलम १३८) कायदेशीर अटी पूर्ण होत असतील, तर चेक बाऊन्सचा खटला सुरुवातीच्या टप्प्यावरच (खटल्यापूर्वी) रद्द करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या निकालात स्पष्ट केले आहे. संबंधित प्रकरण हे वैवाहिक वादातून उद्भवलेल्या समझोत्याशी संबंधित आहे. एका तक्रारदार महिलेच्या पतीला ५० कोटी रुपये देण्याचे मान्य झाले होते. या व्यवहारासाठी […] The post चेक बाऊन्स तक्रार खटल्यापूर्वीच्या टप्प्यावर रद्द करता येत नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अजितदादा लोकांच्या मनात:फोटो लावले काय किंवा नाही लावले काय, त्याने फरक पडत नाही- अमोल मिटकरी
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्याच्या बॅनरवरून अजित पवार यांचा फोटो गायब असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी सुनील तटकरे यांच्या मेळाव्यातही असाच प्रकार घडल्याच्या पार्श्वभूमीवर, आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना खोचक टोला लगावला असून, अजित दादा हे जनतेच्या मनामनात वसलेले आहेत, त्यामुळे बॅनरवर त्यांचा फोटो लावला काय किंवा नाही लावला काय, याने काहीच फरक पडत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फोटो न लावणारे लोक लोकांच्या मनातील अजित पवारांना कसे पुसून टाकतील? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. मात्र, पुढच्या काळात असे प्रकार होणार नाहीत आणि कार्यकर्त्यांची मन दुखावली जाणार नाहीत याची काळजी संबंधित नेत्यांनी घ्यावी, असे आवाहनही मिटकरी यांनी केले आहे. अमोल मिटकरी म्हणाले, ही गोष्ट खरी आहे की अजितदादांवर प्रेम करणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आहे, एखाद्या बॅनरवर दादांचे फोटो नसतील तरी दादा मनातून गेले असे होत नाही, दादा प्रत्येकाच्या घराघरात आहेत मनामनात आहेत, 18 पगड जातीच्या मनात दादा आहेत, त्यामुळे कोणी फोटो टाकले असतील कोणी टाकले नसतील याला त्याला महत्त्व नाही. फोटो टाकले काय, नाही टाकले काय त्याने काही फरक पडत नाही, पण माझी विनंती आहे दादांना मानणारा वर्ग पुढे दुखावणार नाही याची काळजी प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावी, आणि अजित दादांचा योग्य तो सन्मान व्हावा. पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे दिसताहेत शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी या प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, रायगड मध्ये तटकरेंना जशी अजितदादांची अडचण तशीच आता पटेलांच्या विदर्भात तिरोडा येथील NCP पक्षाच्या अधिकृत बैठकीतील बॅनरवर अजित पवार यांचा फोटो नाहीच. फक्त स्वतःचे फोटो लावणाऱ्या पटेल तटकरे या दोन्ही नेत्यांनी दाखवून दिले की आम्ही तुमचे नसून स्वतंत्र आहोत. पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसत आहेत.
मुंबई : प्रतिनिधी एसटीने सुट्टीत प्रवास करणा-या सर्वसामान्य नागरिकांसाठी खिशाला चाट देणारी बातमी दिली आहे. एसटी महामंडळानं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता आणि त्यामुळं होणारी गर्दी लक्षात घेता भाडेवाढ केली आहे. माहितीनुसार, साध्या बसेसच्या दरामध्ये दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. १५ एप्रिल ते १५ जून या काळासाठी ही वाढ करण्यात आली आहे. फक्त साध्या बसेसला […] The post लालपरीच्या तिकीट दरात वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका धक्कादायक घटनेत, एका महिलेने दुसऱ्या लग्नात अडथळा ठरणाऱ्या आपल्या ११ महिन्यांच्या बालकाची हत्या केली. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी महिलेला अटक केली आहे. यश रवींद्र पवार (वय ११ महिने) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. पूजा रवींद्र पवार (वय २२, रा. भांबार्डे) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. पूजाचा विवाह रवींद्र पवार यांच्याशी झाला होता. ८ मार्च रोजी पूजा आपल्या मुलासह घरातून निघून गेली होती. पत्नी आणि मुलगा बेपत्ता झाल्याने रवींद्र पवार यांनी ८ मार्च रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. ५ एप्रिल रोजी पूजा जांबूत गाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने सांगितले की, मी झोपेत असताना यश ओट्यावरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच मी त्याचा मृतदेह पोत्यात भरून दगड टाकले आणि विहिरीत फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपास आणि शवविच्छेदन अहवालातील माहितीनुसार पोलिसांचा पूजावरील संशय बळावला. पोलिसांनी तिला पुन्हा ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. पूजाने पोलिसांना सांगितले की, मुलगा सतत रडत असे आणि मला दुसरे लग्न करायचे होते. मुलगा दुसऱ्या लग्नात अडथळा ठरत असल्याने मी त्याला कपडे धुण्याच्या दगडावर आपटून ठार केले. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून, त्यात दगड टाकून विहिरीत फेकून दिला. या कबुलीनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पूजाला अटक केली. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक निरीक्षक अशोक चव्हाण, उपनिरीक्षक नीळकंठ तिडके, पोलीस कर्मचारी विलास आंबेकर, नितीन भोस, किशोर शिवणकर आणि नीलम जाधव यांनी या प्रकरणाचा तपास केला.
मद्यधुंद चालकाची वाहनांना धडक:कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांचे अपहरण करण्याचा प्रयत्न
पुणे शहरातील वारजे भागात एका मद्यधुंद मोटार चालकाने चार ते पाच वाहनांना धडक दिली. त्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे वाहतूक विभागातील पोलिस शिपाई अमोल पिसाळ यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर हे न्यायालयीन कामकाजासाठी वारजे परिसरातून जात असताना, वारजे-एनडीए रस्त्यावर एका भरधाव प्रवासी मोटारीने पाच ते सहा वाहनांना धडक दिल्याचे त्यांनी पाहिले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक क्षीरसागर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मोटार चालकाचा पाठलाग सुरू केला. वारजे चौकाजवळ चालकाने एका टेम्पोला धडक दिल्यानंतर क्षीरसागर यांनी प्रसंगावधान राखून मोटार अडवली. त्यांनी वारजे माळवाडी वाहतूक शाखेतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना माहिती देऊन चालकाला ताब्यात घेऊन पोलिस चौकीत नेण्यास सांगितले. वाहतूक पोलिस मोटारीत बसल्यानंतर चालकाने मोटार पोलिस चौकीकडे न नेता दुसऱ्या मार्गाने भरधाव वेगाने नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच क्षीरसागर यांनी मोटार काही अंतरावर अडवली. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत चालकाने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. जगदाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्लॉट विक्रीमध्ये फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल दोन हजार स्केअर फुटचा मोकळा प्लॉट दाखवून त्या बदल्यात 48 लाख रूपये घेऊन प्लॉट न देता फसवणूक केलयाप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिष गिरीधरीलाल चौधरी (48), दिनेशकुमार गिरीधरीलाल चौधरी (45), सुरेश गिरीधरीलाल चौधरी (42रा) आणि उर्मिला सुरेश चौधरी (35, रा. वाल्हेकर वाडी, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरेशकुमारता राजी चौधरी (41, रा. स्वामी रेसिडेन्सी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात 48 लाखांच्या फसवणूक प्रकरणी तक्रार दिली आहे.
पीएमपी बस प्रवासात उलटीचा बहाणा करून एका महिला प्रवाशाच्या पिशवीतून सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेकडून ६ लाख ९० हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावरील वैदुवाडी परिसरात ही घटना घडली होती. ननिता दिनेश कांबळे (वय ३७, सध्या रा. विश्रांतवाडी, मूळ रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार महिला ३० मार्च रोजी हडपसर गाडीतळ ते चिंचवड या मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत होती. त्या वेळी शेजारी थांबलेल्या कांबळेने प्रवासात उलटी आल्याचा बहाणा केला. तक्रारदार महिलेचे लक्ष विचलित करून, तिच्या नकळत पिशवीतून सात लाख रुपयांचे दागिने चोरून नेले होते. दागिने चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेनंतर वानवडी पोलिसांनी तपास सुरू केला. हडपसरमधील शिंदे वस्ती परिसरात एक महिला दागिने विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विष्णू सुतार आणि अमोल गायकवाड यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ननिता कांबळेला ताब्यात घेतले. तिच्याकडून ६ लाख ९० हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत ननिता कांबळेने पीएमपी बसमधील प्रवासी महिलेचे दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहायक आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विठ्ठल चोमले, बालाजी वाघमारे, अर्शद सय्यद, अभिजित चव्हाण आणि आशिष कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की:ट्रिपलसीट दुचाकीस्वारासह तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर 'ट्रिपलसीट' दुचाकीस्वारांना अडवणाऱ्या वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेत पोलिसाच्या गणवेशाची पट्टी तुटली. या प्रकरणी दुचाकीस्वारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक शाखेतील पोलिस शिपाई सोहल शेख यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. नितीन रामदास कराळे (वय २८, दुचाकीस्वार) आणि संदीप दिनकर सोनवणे (वय ३४, रा. शेल पिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर घडली. पोलिस शिपाई शेख यांनी एकाच दुचाकीवरून ट्रिपलसीट जात असलेल्या तिघांना पाहिले आणि त्यांना थांबवले. चौकशी सुरू असताना दुचाकीस्वार आणि त्याच्या साथीदारांनी शेख यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. 'आम्ही एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत,' असे सांगत त्यांनी कारवाईला विरोध केला आणि पोलिस शिपाई शेख यांना धक्काबुक्की केली. ओैंध रस्ता परिसरात भरदिवसा घरफोडी पुणे शहरातील ओैंध रस्ता परिसरात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातून साडेचार लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एकाने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारादार तरुण ओैंध रस्त्यावरील श्री चेतन सोसायटीत राहायला आहे. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ते कुटुंबीयासोबत कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्याने कपाटातील साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते घरी परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत. शहर परिसात गेल्या काही दिवसांपासून भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील १६ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत एकाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस हवालदार एस माने तपास करत आहेत. या धक्काबुक्कीत शेख यांच्या गणवेशावरील पट्टी तुटली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक मोकाशी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात ३००० रुपयांनी वाढ
जळगाव : प्रतिनिधी इराण-अमेरिका यांच्यामध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या युद्धाला अखेर युद्धविराम मिळाला आहे. युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात मोठ्या घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सोने-चांदीच्या दरामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या दरात मोठा बदल झाला […] The post युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात ३००० रुपयांनी वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपूर लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेतील २२.७० लाख रुपयांच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा लावला आहे. या प्रकरणी नांदेड येथील २३ वर्षीय व्हेटरनरी विद्यार्थी रोहित मारोती दुय्येवार याला अटक करण्यात आली आहे. ऑनलाइन बेटिंगमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे त्याने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे तपासात उघड झाले आहे. ही घटना २९ मार्च रोजी पहाटे नागपूर स्थानकावर घडली. रायपूर येथील हरिशचंद चंदवाणी हे कुटुंबासह बिकानेर एक्सप्रेसने प्रवास करत असताना त्यांच्या पत्नीने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स डोक्याखाली ठेवून झोपल्या होत्या. गाडी नागपूर स्थानकावर थांबलेली असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या झोपेचा फायदा घेत पर्स लंपास केली. काही वेळाने पर्स बाथरूममध्ये रिकामी आढळल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, ज्यात एक संशयित व्यक्ती चोरी करून स्टेशनबाहेर जाताना दिसली. रॅपिडो बुकिंगमधून मिळालेल्या मोबाईल नंबरच्या आधारे तांत्रिक तपास करून पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. आरोपी नांदेडहून नागपूरकडे ट्रॅव्हल्सने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून ९ ते १० ट्रॅव्हल्स तपासल्या. रहाटे कॉलनी परिसरात संशयित दिसताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून रोहित दुय्येवार याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही, परंतु सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्याकडून १७.४३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
भारताने केली अणुऊर्जा संयंत्राने ‘क्रिटिकॅलिटी’ साध्य
कलपक्कम : अणुऊर्जा क्षेत्रात भारताने पुन्हा एकदा आपला डंका वाजवून संपूर्ण जगालाच आश्चर्यचकित केले आहे. तामिळनाडूतील कलपक्कम येथील अणुऊर्जा संयंत्राने क्रिटिकॅलिटी (क्रांतिकता) साध्य करून नुकता भारताच्या ऊर्जा क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. महत्वाचे म्हणजे, भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम याच गतीने पुढे जात राहिला तर, या क्षेत्रातही भारत आत्मनिर्भर होण्यास वेळ लागणार नाही. याचे महत्व म्हणजे, […] The post भारताने केली अणुऊर्जा संयंत्राने ‘क्रिटिकॅलिटी’ साध्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून नुकतीच बदली करण्यात आलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन केले. 'तुकाराम मुंढे यांची बदली रद्द झालीच पाहिजे' अशा घोषणांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला असून, मुंबईतील मंत्रालय परिसरातील आंदोलनानंतर आता नांदेडमध्येही या मागणीचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. राज्य सरकारने प्रशासकीय स्तरावर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा धडाका लावला असून, मंगळवारी सायंकाळी 11 अधिकाऱ्यांचे फेरबदल करण्यात आले. यापूर्वीच गेल्या आठवड्यात तब्बल 25 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, ज्यात अनेकांना महत्त्वाच्या मोक्याच्या जागांवर तर काहींना महामंडळे व प्राधिकरणांवर नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री सचिवालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी वर्णी लागली असून, या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे, आपल्या धडाडीच्या कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली आहे. मात्र, दिव्यांग विभागाचे सचिव म्हणून मुंढे यांनी घेतलेल्या लोकहितवादी निर्णयामुळे दिव्यांग बांधवांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी आदराची भावना असून, ही बदली रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी मुंबईतील मंत्रालय परिसरातील आंदोलनानंतर आता नांदेडमध्येही दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, मुंढे यांची नियुक्ती पुन्हा दिव्यांग विभागातच कायम ठेवण्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, नानादेड जिल्हाधिकारी कार्यालयात आज विधिमंडळ अंदाज समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीवेळी दिव्यांग बांधव तुकाराम मुंढे यांच्या बदलीवरून आक्रमक झाले होते. दिव्यांग बांधव आक्रमक झाल्याचे पाहून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शाश्वत नागरी विकास, औद्योगिक व पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात विन ग्रुप कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सोबत सामंजस्य करार केला. विन ग्रुप कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यात शाश्वत विकास, हरित ऊर्जा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गतिशील वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन आणि विन ग्रुपचे (आशिया ऑपरेशन्स) मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सान्ह चाऊ यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. विन ग्रुपचे महाराष्ट्रात येणे सन्मानाची बाब यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या विकासाच्या पार्श्वभूमीवर विन ग्रुपचे महाराष्ट्रात येणे ही आनंददायी आणि सन्मानाची बाब आहे. कंपनी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करत असून मुंबई व रायगड परिसर हा भविष्यात जागतिक स्तरावर स्पर्धा करणारा सर्वात गतिमान शहरी भाग ठरणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर सशक्त आणि गतिमान शहरी वातावरण निर्माण होईल. राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा गुंतवणूकदारांना पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन देत कोणतीही अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांसोबत तसेच थेट संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. मागील काही वर्षांच्या अनुभवावरून राज्य प्रशासन कोणतीही समस्या सोडवण्यास सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील निवडक ठिकाणी प्रकल्प या कराराअंतर्गत विन ग्रुपकडून पुढील दोन वर्षांत सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक प्रस्तावित असून सुमारे 5 हजार एकर क्षेत्रावर विविध प्रकल्प उभारले जाणार आहेत. या माध्यमातून सुमारे 24 हजार 700 थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील इतर निवडक ठिकाणी हे प्रकल्प साकारले जाणार आहेत. या करारानुसार स्मार्ट निवासी टाऊनशिप, इलेक्ट्रिक मोबिलीटी सोल्यूशन्स, सामाजिक व सार्वजनिक पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, पर्यटन व मनोरंज या क्षेत्रात विन ग्रुप गुंतवणूक करणार आहे. या करारानुसार मोठ्या प्रमाणावर स्मार्ट निवासी टाउनशिप उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. सुमारे 2,700 एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाची, पर्यावरणपूरक आणि एकात्मिक टाउनशिप विकसित केली जाणार असून सुमारे दोन लाख लोकसंख्येचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव असून मोबिलिटी-एज-अ-सर्व्हिस प्लॅटफॉर्मही विकसित केला जाणार आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर भर सामाजिक आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये विनस्कूलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा, विनमेकच्या माध्यमातून मल्टीस्पेशालिटी रुग्णालये तसेच व्ही ग्रीन मार्फत राज्यभर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग नेटवर्क उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 170 एकर क्षेत्राचा वापर होणार आहे. याशिवाय 500 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारून स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर भर दिला जाणार असून त्यासाठी सुमारे 1,200 एकर जमीन आवश्यक राहणार आहे. पर्यटन क्षेत्रालाही चालना देण्यासाठी सुमारे 865 एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा थीम पार्क, प्राणीसंग्रहालय आणि सफारी प्रकल्प उभारण्याची योजना आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातील पर्यटनवृद्धीसह मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. या कराराच्या वेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन, मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे, तसेच विन ग्रुपचे (आशिया ऑपरेशन्स) मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सान्ह चाऊ, व्हिएतनामचे महावाणिज्यदूत ले क्वांग बिएन, सल्लागार गोकुल कांत टी, अमन सिंग, वैभव ठाकूर आदी उपस्थित होते.
इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात
मुंबई : पश्चिम आशियातील युद्ध आणि जागतिक भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम आता भारतीय सर्वसामान्यांच्या खिशावर होताना दिसत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी त्यांच्या ताज्या मॉनेटरी पॉलिसी बैठकीत भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. मिडल ईस्ट संकटामुळे आगामी काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता असून जीडीपी वाढीचा वेगही मंदावणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले […] The post इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील सासवड ते कोंढवा दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला 'हिंदू जनआक्रोश मोर्चा' पोलिसांनी मधेच रोखल्याने तणाव निर्माण झाला आहे. या मोर्चाअंतर्गत आयोजित केलेली बाईक रॅली खडी मशीन चौकापर्यंत जाणार होती आणि तिथे गोपीचंद पडळकर यांची सभा होणार होती. मात्र पोलिसांनी ही रॅली नियोजित स्थळापूर्वीच अडवल्याने गेल्या दीड तासांपासून आमदार पडळकर आणि संग्राम जगताप पुढे जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातील बापदेव घाट परिसरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या 'हिंदू जनआक्रोश मोर्चा'ला रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी आज पहाटेपासूनच कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शिवतीर्थ सासवड येथून निघालेली ही भव्य बाईक रॅली कोंढव्यातील खडीमशीन चौकापर्यंत जाणार होती. मात्र कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले आहेत. या रॅलीत मोठ्या संख्येने तरुण आणि नागरिक सहभागी झाले असून, मार्गावर तैनात असलेल्या मोठ्या पोलीस फौजफाट्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. कोंढव्यातील संशयितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून कोंढव्यातील संबंधित संशयितांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, तसेच भिवरी ग्रामस्थांवर दाखल केलेले कथित खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी आक्रमक मागणी करण्यात येत आहे. या मागण्यांसह पुरंदर तालुक्यातील जमीन खरेदी प्रकरणातील अन्यायावरही या आंदोलनाद्वारे भूमिका मांडली जाणार आहे. बापदेव घाट प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर खडी मशीन चौकात सभा घेण्यासाठी आक्रमक झाले असून पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. बापदेव घाटात घडलेल्या मारहाण प्रकरणानंतर ग्रामस्थांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेऊन कोंढव्यातील संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, ही या मोर्चाची प्रमुख मागणी आहे. याशिवाय, पुण्यातील 'लव्ह जिहाद'च्या घटनांविरोधात आवाज उठवण्यासाठी या सभेचे नियोजन करण्यात आले होते. कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात दुसरीकडे, खडी मशीन चौक परिसरात अन्य धर्मीय नागरिकही जमायला लागल्याने संभाव्य संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गोपीचंद पडळकर नियोजित स्थळी पोहोचल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो, ही भीती लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला आहे. कोणत्याही प्रकारचा जातीय तणाव किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण परिसरात सध्या कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिलांना भोंदूबाबांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. महिलांनी भोंदूबाबांकडे जाणे बंद करावे. हे लोक स्वतःला ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, पार्वती असे काहीही म्हणतात. आपण त्यांच्या बोलण्याला बळी पडू नये. व्हायरल व्हिडिओमध्ये कोणती बाई बेशुद्ध दिसते? आपला समाज कोणत्या दिशेला चाललाय? असा परखड सवाल त्यांनी या प्रकरणी केला आहे. राज्यात सध्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यानंतर अनेक महिलांनी अशोक खरातने आपण बेशुद्धावस्थेत असताना आपले लैंगिक शोषण केल्याचा दावा केला आहे. पण शर्मिला ठाकरे यांनी हाच धागा पकडत कोणत्या व्हिडिओमध्ये महिला बेशुद्ध दिसतात? असा तिखट सवाल उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी महिलांना अशा भोंदूबाबांपासूर स्वतःला दूर ठेवण्याचेही आवाहन केले. काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे? शर्मिला ठाकरे म्हणाल्या, महिलांनी सर्वप्रथम भोंदूबाबांकडे जाणे बंद करावे. आमचे 13 आमदार आले होते, तेव्हा आमच्याकडे भोंदूबाबांसाठी अनेकजण आले होते. हे भोंदूबाबा स्वतःला ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, पार्वती असे काहीही म्हणतात. पण आम्ही कुणाच्याही पाया पडत नाही. या लोकांनी आमच्यासोबत फोटो काढून लोकांना आम्ही त्यांचे भक्त आहोत असे सांगितले तर आम्ही तिथे येऊन त्यांच्या कानशिलात हाणणार. त्यामुळे आमच्याकडे कुणी येतच नाही. भोंदूबाबा फसवतात म्हणजे काय? तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघितले असतील. त्यात कोणती बाई बेशुद्ध दिसते हो तुम्हाला. काय आहे हे? काय चाललंय हे? आपला समाज कोणत्या दिशेला चालला आहे?, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. अशोक खरात कसा करायचा लैंगिक शोषण? या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या मते, अशोक खरात हा पीडित व त्यांच्या कुटुंबीयांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. त्यांना खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी या सगळ्या गोष्टींची भीती दाखवून पैसा उकळत होता. विशेषतः महिलांना त्यांच्या कुटुंबात मृत्यूची भीती दाखवून व बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने महिलांचे शोषण केले. त्याचप्रकारे ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारात हातचलाखी करून स्वत:कडे दैवीशक्ती असल्याचे सांगून तो समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचेही काम करत होता. पण आता पीडित महिला व त्यांचे कुटुंब मोठ्या धाडसाने समोर आलेत. त्यांच्याच मदतीने त्याच्याविरोधात विविध गुन्हे दाखल करण्यात आलेत.
मित्रांसोबत झालेल्या वादानंतर तसेच वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला न बोलवल्यामुळे नैराश्यातून एका 24 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने 'माझे दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो' असे स्टेटस ठेवले होते. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील हा तरुण असून त्याचे नाव महेश उद्धव भणगे असे आहे. त्याने राहत्या घरीच विष प्राशन करून हे टोकाचे पाऊल उचलले आहे. जवळच्या मित्राच्या वाढदिवसाला न बोलावल्याने महेश काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होता आणि यातूनच त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. घराच्या छतावर जाऊन केले विष प्राशन मिळालेल्या माहितीनुसार, महेशने पाणी पिण्याच्या तांब्यात विषारी द्रव्य मिसळून प्राशन केले. दुपारच्या वेळी तो एकटाच घरच्या छतावर गेला होता. मात्र, बऱ्याच वेळ झाला तरी तो खाली न आल्याने रात्री 8 च्या सुमारास त्याचे कुटुंबीय त्याला पाहण्यासाठी छतावर गेले. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 'माझे दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो' महेशने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाइलवरून स्टेटस ठेवले होते. त्याने असे लिहिले होते की, 'माझे दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो', असे भावनिक स्टेटस त्याने ठेवले होते. दरम्यान, गेल्या सोमवारी (दि. 6 एप्रिल) त्याच्या एका मित्राचा वाढदिवस होता. मेशला यावेळी मित्रांनी बोलावले नाही. त्याला सोडूनच इतर मित्रांनी सेलिब्रेशन केले. या घटनेमुळे महेशला फार वाईट वाटले व यातून तो प्रचंड नैराश्यात गेला व यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे कुंबेफळ गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच अंबाजोगाई ग्रामीण पोलिस घटनेचा तपास करत आहेत.
कोल्हापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना म्हणजे समरजीत घाटगे यांची भाजपमध्ये झालेली घरवापसी. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले घाटगे आता पुन्हा ‘कमळ’ हाती घेतल्याने राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत आहेत. मुंबईतील भाजप मुख्यालयात मंत्री चंद्रकांत पाटील आणि रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृत प्रवेश केला. या निर्णयापूर्वी आपण शरद पवारांना सांगूनच पाऊल उचलल्याचेही घाटगे यांनी स्पष्ट केले होते. घाटगेंच्या या पुनरागमनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षााचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, घाटगे हे मुळात भाजपचेच होते आणि फक्त तिकीटासाठी राष्ट्रवादीत आले होते. आता त्यांची परतफेरी ही केवळ वैयक्तिक राजकीय सोय नसून मोठा राजकीय संकेत आहे. विशेषतः कोल्हापूरमधील नेते हसन मुश्रीफ यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचा इशाराही त्यांनी दिला. भाजप स्वबळाच्या तयारीत - शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की, घाटगेंना पुन्हा भाजपमध्ये घेणे म्हणजे मित्रपक्षांना स्पष्ट संदेश देणे आहे. भाजप येत्या काळात स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी अशा नेत्यांची गरज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात दिलेला स्वबळाचा संदेश आता प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे महायुतीतील इतर पक्षांनीही या घडामोडी गांभीर्याने घ्याव्यात, असे शिंदेंनी सूचित केले. संघटनात्मक बदलांचा आढावा याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक पातळीवरही हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्ष मजबूत करण्यासाठी राज्यभर बैठकांचे आयोजन केले जात आहे. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत विविध सेलच्या बैठका घेतल्या जात असून कार्यकर्त्यांची नव्याने नियुक्ती केली जात आहे. जिल्हा आणि राज्य पातळीवरील संघटनात्मक बदलांचा आढावाही घेतला जात आहे. आगामी काळात राज्यभर दौरे करून विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेण्याची तयारी सुरू असल्याचे शिंदेंनी सांगितले. घाटगे खिडकीला लटकून जात आहेत - सतेज पाटील दरम्यान, काँग्रेसकडूनही या घडामोडींवर प्रतिक्रिया उमटली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी घाटगेंच्या भाजप प्रवेशावर टोला लगावला. भाजपच्या गाडीत जागा नाही, तरीही घाटगे खिडकीला लटकून जात आहेत, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. घाटगेंच्या पुनरागमनामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः 2029 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काँग्रेसने बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली नाही. भाजप या प्रकरणी मुद्दा अफवा पसवून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक करत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. बारामती विधानसभा मतदासंघात येत्या 23 तारखेला पोटनिवडणूक होत आहे. ही जागा अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार येथून सत्ताधारी महायुतीतर्फे निवडणूक लढवत आहेत. त्यांना विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही पाठिंबा दिला आहे. पण काँग्रेसने ही लढवण्याची घोषणा करत येथून आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. पण आज अचानक काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची चर्चा सुरू झाली असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी तातडीने उपरोक्त स्पष्टीकरण दिली आहे. काँग्रेसशी भाजपच्या कोणत्याही नेत्याने संपर्क साधला नाही बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने काँग्रेस पक्षाशी अद्याप संपर्क साधलेला नाही. या संदर्भात प्रसारित होत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि निराधार आहेत. अशा अफवा मुद्दाम पसरवून भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक करत आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी स्थिती स्पष्ट करताना सांगितले आहे. ‘झाडखाऊ’ म्हणत फडणवीसांवर निशाणा हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिक येथील वृक्षतोडीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी फडणवीसांचा उल्लेख 'झाडखाऊ' असा केला आहे. ‘झाडखाऊ’ची कुऱ्हाड आरे नंतर आता नाशिक वर, उद्या असेल संपूर्ण महाराष्ट्रावर, असे ते म्हणालेत. या प्रकरणी त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात कुऱ्हाड असून, त्यांच्यापुढे तोडलेल्या झाडांचे बुंधे दिसत आहेत. हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. विजय वडेट्टीवारांचाही महायुतीवर निशाणा दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही नाशिक येथील कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचारावरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांना मलिदा गँगची उपमा दिली आहे. हिंदू खतरे मे है..., एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे असे हिंसक नारे भाजपला का द्यावे लागतात हे आता सर्वांना समजलंच असेल. भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सत्तेत आलेले बोके स्वतःच भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न झाले आहेत. जनतेला याची खबर होऊ नये म्हणून त्यांच्यात धार्मिक वाद पेटण्याचे कसब भाजपने वापरले. धर्माच्या नावावर सत्तेत आलेले स्वतः मात्र कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक कार्यातही कोट्यावधींचा भ्रष्टाचार करत आहेत. हा पैसा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आहे. आपल्या भ्रष्टाचाराने, अमानुष वृक्षतोडीने कुंभमेळ्यासारख्या पवित्र कार्याला बदनाम करणाऱ्या ट्रिपल इंजिन मलिदा गँगला या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल, असे वडेट्टीवार म्हणालेत.
नवी मुंबईतील वाशी येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी मोठी कारवाई करत विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे (वय 55) यांना 22 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला वाशी येथील मंडळाच्या कार्यालयातील विद्युत देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट 1 सप्टेंबर 2025 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी देण्यात आले होते. या कंत्राटांतर्गत नोव्हेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या चार महिन्यांचे सुमारे 3.16 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे यांनी 7 टक्के कमिशन म्हणून 22,176 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. ही लाचेची मागणी भांडार विभाग प्रमुख मनोहर पवार यांच्या मध्यस्थीने करण्यात आली होती. 25 मार्च रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीची 6 एप्रिल रोजी पडताळणी केल्यानंतर, 7 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे त्यांच्याच केबिनमध्ये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लाचखोरीच्या या थेट कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, लाच प्रकरणात अडकलेल्या याच राजेंद्र आहिरे यांनी फेब्रुवारी महिन्यात निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्यासह 19 जणांविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. अलिबाग आणि खोपोली येथील शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी तयार करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी या तक्रारीत केला होता. यापूर्वीच्या तक्रारीत आहिरे यांनी 2018 पासून सुमारे 1.25 कोटी रुपयांच्या सरकारी वेतन अनुदानाचा अपहार झाल्याचा गंभीर दावा केला होता. मात्र आता ते स्वतःच लाचेच्या जाळ्यात अडकल्याने शिक्षण विभागात मोठी चर्चा सुरू आहे. भ्रष्टाचार उघड करणाऱ्या अधिकाऱ्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होऊन अटक झाल्याने या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले असून पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. कोण आहेत राजेंद्र अहिरे? राजेंद्र अहिरे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात विविध महत्त्वपूर्ण पदांवर कार्यरत असून, त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात मुंबई विभागात शिक्षण निरीक्षक म्हणून केली होती. त्यानंतरच्या काळात त्यांनी राज्य मंडळाच्या नाशिक विभागाचे विभागीय सचिव, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय शिक्षण उपसंचालक अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या ते राज्य मंडळाच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.
स्मृती मानधना -पलाश मुच्छलचा पॅचअप ?
मुंबई : प्रतिनिधी सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्मृती मानधनाचे कुटुंबीय आणि पलाश मुच्छलचे कुटुंबीय एकत्र असल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्मृती आणि पलाश पुन्हा एकत्र आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांचे लग्न होणार होते. त्यांच्या लग्नासाठी […] The post स्मृती मानधना -पलाश मुच्छलचा पॅचअप ? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औंढा नागनाथ पंचायत समितीच्या गटसाधन केंद्राला लागलेल्या आगीमध्ये संकलीत मूल्यमापन चाचणीचे तब्बल १२ हजार पेपर जळून खाक झाले आहेत. बुधवारी ता. ८ हा प्रकार घडला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे पेपरची मागणी नोंदविण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांनी सांगितले. राज्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून इयत्ता तिसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांची संकलीत मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे. भाषा, गणित व इंग्रजी विषयाची हि परिक्षा असून ता. ११, ता. १५ व ता. २२ एप्रील रोजी हि परिक्षा होणार आहे. त्यासाठी परिषदेकडून सर्व जिल्हयांना पेपरचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातही पेपरचा पुरवठा झाला असून जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर व तालुकास्तरावरून केंद्रस्तरावर पेपर पाठविले जात आहेत. मागील तीन दिवसांपासून हे काम सुरु आहे. दरम्यान, औंढा नागनाथ गटसाधन केंद्रातून तालुक्यातील १३ केंद्रापैकी सात केंद्रांना पेपर वाटप झाले असून सहा केंद्रावर पेपर वाटप करण्याचे काम सुुर होते. मात्र आज सकाळी गटसाधन केंद्रातून धुर निघत असल्याचे कर्मचाऱ्याला दिसून आले. त्यानंतर कर्मचारी पांडूरंग सुर्यवंशी यांनी सदर प्रकार गटशिक्षणाधिकारी मोहम्मद तौफीक यांना कळविला. गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे, गटशिक्षणाधिकारी तौफीक, विस्तार अधिकारी संजय मेथेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, जमादार वसीम पठाण, शेख इकबाल, रवीकांत हरकाळ यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान, या आगीमध्ये तब्बल १२ हजार पेपर जळून खाक झाले असल्याचे गटशिक्षणाधिकारी तौफीक यांनी सांगितले. शार्ट सर्किटमुळे हि आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्यादृष्टीने पोलिसांनीही माहिती घेण्यास सुरवात केली आहे. परिषदेकडे पेपरची मागणी नोंदविली हिंगोलीच्या शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांनी या प्रकरणी परिषदेकडे पेपरची मागणी नोंदवल्याची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, सदर घटनेमध्ये १२ हजार पेपर जळाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मिळाली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये तसेच चाचणी सुरळीत पार पडावी यासाठी परिषदेकडे पेपरची मागणी नोंदवली आहे. पेपर प्राप्त झाल्यानंतर ठरवून दिलेल्या तारखेलाच परिक्षा होईल.
खासदार मेधा कुलकर्णी यांनी 'लव्ह जिहाद'च्या बळी ठरलेल्या महिलांसाठी 'ऑपरेशन दुर्गा अभियान' सुरू करण्याची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत समाजात जनजागृती करून पीडित महिलांना समुपदेशन, पुनर्वसन आणि आवश्यक मदत दिली जाईल. या अभियानासाठी लवकरच एक हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या माध्यमातून पीडितांना त्वरित संपर्क साधता येईल. यावेळी त्यांनी सायली सुर्वे या महिलेच्या 'घरवापसी'चे यश नमूद केले. सायलीचा पती आतिफ तासे याच्यावर 28 गुन्हे दाखल असून, त्याला तातडीने अटक करून सायलीला घटस्फोट मिळावा अशी मागणी कुलकर्णी यांनी केली. सायलीवर मानसिक दडपण असून, तिच्या चार मुलांना आणि आई-वडिलांनाही धोका असल्याचे त्यांनी सांगितले. सायली सुर्वेला 'घरवापसी'नंतरही पोलीस संरक्षण मिळाले नाही, यावर कुलकर्णी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्थानिक पोलिसांनी वेळीच संरक्षण दिले असते तर तिच्या सासरच्यांनी तिला बळजबरीने परत नेले नसते, असे त्या म्हणाल्या. सायलीच्या मानसिक स्थितीकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. सायलीने सासू गुलशन तासे हिच्या विरोधात दबावाखाली दिलेला जबाब पोलिसांनी ग्राह्य धरू नये, असेही कुलकर्णी यांनी म्हटले. गुलशन तासेवर अनेक गुन्हे दाखल असून, तिच्या चार सुना हिंदू आहेत आणि काहींनी सासूविरोधात तक्रारीही केल्या आहेत. हा 'लव्ह जिहाद'चा प्रकार असल्याचे कुलकर्णी यांनी अधोरेखित केले. पोलीस ठाण्यांमध्ये भरोसा सेलप्रमाणे स्वतंत्र 'लव्ह जिहाद' सेल स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र सरकारने बळजबरीने धर्म बदलण्यासाठी कोणावरही दबाव टाकला जाणार नाही, असा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणविरोधात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधीची घोषणा केली. इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची धमकी देणा-या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणने सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला. दोन्ही देशांनी घेतलेल्या निर्णयाने इराणमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार आज बुधवारी सकाळी पाच वाजल्यानंतर […] The post अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू असल्याचा दावा करणाऱ्या खासदार पार्थ पवार यांच्यावर काँग्रेसचे बारामतीचे उमेदवार आकाश मोरे यांनी पलटवार केला आहे. पार्थ पवार हायफाय इंग्लिश मीडियममध्ये शिकलेत. त्यामुळे ते काँग्रेसवर टीका करताना मराठी शब्द न सूचल्यामुळे डाऊनफॉल म्हणाले असतील, असे ते म्हणालेत. आकाश मोरे यांनी बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना आव्हान दिले आहे. त्यांनी बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बारामती निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. तसेच बारामतीची पोटनिवडणूक लढवल्यामुळे राज्यात काँग्रेसचा डाऊनफॉल होईल अशी टीका करणाऱ्या खासदार पार्थ पवार यांचाही समाचार घेतला. त्यांच्या या टीकेमुळे बारामतीच्या निवडणुकीत अधिकच रंग भरला आहे. पार्थ पवार हायफाय इंग्लिश मीडियममध्ये शिकलेले आकाश मोरे म्हणाले, मी सेमी इंग्लिशमध्ये शिकलेला माणूस आहे. तरीही मला मराठीचे काही शब्द येत नाहीत. पण ते (पार्थ पवार) इंग्लिश मीडियम हायफायमध्ये शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांना तेच म्हणायचे होते की, दम द्यायचा होता, काय करायचे होते हे मला माहिती नाही. पण मला असे वाटत आहे की, त्यांना मराठी शब्द सापडला नसेल. त्यामुळेच ते डाऊनफॉल म्हणाले असतील. काँग्रेस आपली भूमिका नेहमी मांडत असते. संविधान वाचवण्याची जबाबदारी एका माणसावर आली आहे. काँग्रेस ती जबाबदारी नेटाने पेलत आहे. आमच्या काँग्रेसचा एकेक कार्यकर्ता हजारांच्या बरोबर आहे. आमच्याकडे पैशाची बॅकिंग नाही की कसली पावरही नाही. अजित दादांविषयी एफआयआर नोंदवा, अर्ज मागे घेऊ ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आग्रही आहे. पण यासाठी काँग्रेसने काही अटी ठेवल्या आहेत. आमचे म्हणणे आहे की, राज्यातील भाजप प्रणित सरकारने अजितदादांचा घातपात आहे की अपघात आहे, याविषयी एफआयआर नोंदवावा. त्यांनी असे केले की आम्ही तत्काळ अर्ज मागे घेऊ. अन्यथा आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. अजितदादांना न्याय मिळावा, लोकशाही टिकावी, या राज्यातील सुसंस्कृत राजकारण पुनर्जीवित व्हावे अशी आमची इच्छा आहे. शरद पवार ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी सत्ताधारी व विरोधकांचा जसा समन्वय होता तो आता पूर्णः संपुष्टात आला आहे. असे राजकारण पुन्हा अस्तित्वात यावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विधान भवनात चांगला भाषण करणारा विरोधी आमदार असेल तर सत्ताधारी आमदार त्याला पाठीवर थाप देऊन त्याचे कौतुक करायचा. पण आता हाणामारी होते. ही लोकशाहीची अधोगती आहे. ही अधोगती ज्या पद्धतीने झाली त्याविरोधात मी एक प्रतिक म्हणून ही निवडणूक लढवत आहे, असे आकाश मोरे म्हणाले. वरिष्ठ सांगतील ते करणार मी पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता आहे. काँग्रेस पक्ष, राहुल गांधी व हर्षवर्धन सपकाळ यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे ते जे काही आदेश देतील, त्याचे मी तंतोतंत पालन करेल. या सरकारने अजित पवारांच्या अपघाताविषयी काही सकारात्मक गोष्टी केल्या, चौकशी केली किंवा एफआयआर दाखल केला किंवा तसे संकेत दिसले तर आमच्या वरिष्ठांकडून जे सांगण्यात येईल, ते आम्ही करू, असेही आकाश मोरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका; निनावी पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
बीड : प्रतिनिधी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका निनावी पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेस धोका असल्याचा खळबळजनक दावा एका पत्रातून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे या भोंदू बाबा अशोक खरातच्या हस्तक असून त्यांच्यापासून सुनेत्रा पवार यांना धोका असल्याचे यात नमूद करण्यात […] The post सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका; निनावी पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकचा दूसरा भोंदू रवींद्र एरंडेच्या प्रकरणात देखील रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. आता एरंडेने त्याच्या टॅबमध्ये असलेल्या आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओबाबत पोलिसांसमोर धक्कादायक माहिती दिली आहे. माझ्या मैत्रिणींसोबतचे विवस्त्र खासगी फोटो व व्हिडिओ टॅबमध्ये असल्याचे सांगितले आहे. तसेच त्याने खंडणीच्या फिर्यादीतही त्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे फोटो आणि व्हिडिओ साठवून लैंगिक शोषण किंवा खंडणी उकळण्याचा प्रयत्न एरंडे करत होता का? असा तपास पोलिसांकडून केला जात आहे. भोंदू अशोक खरातच्या पावलावर पाऊल ठेवत महिलांना विविध आमिषे दाखवून फसवणूक करणाऱ्या रवींद्र एरंडेचे काळे कारनामे उघड झाले असून, त्याच्या कार्यालयातून पोलिसांनी सापाची कात, पक्ष्यांचे अवयव आणि कवड्यांसारखे साहित्य जप्त केले आहे. स्वतःवरील लैंगिक अत्याचाराचे आरोप लपवण्यासाठी एरंडेने आक्षेपार्ह व्हिडिओच्या नावाखाली खंडणी उकळली जात असल्याचा बनाव रचला होता. मात्र त्याच्याच ऑफिस बॉयने रचलेल्या सापळ्यामुळे त्याचे बिंग फुटले. सातपूर पोलिसांनी एरंडेला लैंगिक अत्याचार आणि ॲट्रोसिटीच्या गुन्ह्याखाली बेड्या ठोकल्या असून, सत्र न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत 10 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. आपल्या मालकाच्या अनैतिक कृत्यांचा भांडाफोड करत ऑफिस बॉयने 12 लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता आणि एरंडेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधितांना अटकही केली होती. मात्र ही तक्रार दाखल करतानाच एरंडेने स्वतःच्या कृत्यांची एकप्रकारे कबुली दिली. मैत्रिणीसोबतचे विवस्त्र खासगी फोटो व व्हिडीओ असलेला टॅब ऑफिसमध्ये ठेवला होता, असा उल्लेख त्याने फिर्यादीत केल्याने त्याचे गुपित उघड झाले आणि तपासादरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या डीव्हीडीमध्ये त्याचे तब्बल 100 आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ आढळून आले आहेत. संशयित रवींद्र एरंडे हा वन्यजीवांचे अवयव आणि जादूटोण्याची भीती दाखवून, तसेच नोकरी-व्यवसायाचे आमिष देऊन गरजूंना शोषत असल्याचा संशय 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ने व्यक्त केला आहे. याप्रकरणी 'अंनिस'ने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देऊन एरंडेची सखोल चौकशी करण्याची आणि त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यासह वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक कार्यात कोट्यवधींचा कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सत्तेत आलेले बोके स्वतःच भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न झालेत. कुंभमेळ्यासारख्या पवित्र कार्यात भ्रष्टाचार करणाऱ्या ट्रिपल इंजिन मलिदा गँगला या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला 6 लाख 37 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात विलास लाड हा नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या टेंडरबाबत धक्कादायक दावे करताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी महायुती सरकार व सत्ताधारी भाजपवर तोंडसूख घेतले आहे. हिंदू खतरे मे है..., एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे असे हिंसक नारे भाजपला का द्यावे लागतात हे आता सर्वांना समजलंच असेल, असे ते म्हणाले. सत्ताधारी बोके भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न विजय वडेट्टीवार या प्रकरणी म्हणाले, हिंदू खतरे मे है..., एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे असे हिंसक नारे भाजपला का द्यावे लागतात हे आता सर्वांना समजलंच असेल. भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सत्तेत आलेले बोके स्वतःच भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न झाले आहेत. जनतेला याची खबर होऊ नये म्हणून त्यांच्यात धार्मिक वाद पेटण्याचे कसब भाजपने वापरले. धर्माच्या नावावर सत्तेत आलेले स्वतः मात्र कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक कार्यातही कोट्यावधींचा भ्रष्टाचार करत आहेत. हा पैसा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आहे. आपल्या भ्रष्टाचाराने, अमानुष वृक्षतोडीने कुंभमेळ्यासारख्या पवित्र कार्याला बदनाम करणाऱ्या ट्रिपल इंजिन मलिदा गँगला या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल. आता पाहू काय आहे व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये विलास लाड म्हणत आहे की, आपल्याला खूप मोठे काम मिळाले आहे. नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचे तब्बल 15 हजार कोटी रुपयांच्या कामांचे बजेट आहे. त्यातील काही निधी केंद्राने दिलाय तर काही राज्याने. अकाउंटला निधी येऊन पडलाय. या कामांचे टेंडर मॅनेज करण्यात आले आहे. मंत्र्यांपासून ते क्लर्क पर्यंत प्रत्येकाचे कमिशन ठरले आहे. त्यामध्ये माझ्या वाट्याला 500 कोटींच्या कामाचा कोटा आला आहे. आपण स्वतः 700 तंबू उभारण्याचे तसेच ई टॉयलेट अन् साफसफाईचे टेंडर घेतले आहे. या कुंभमेळ्यामध्ये नाश्ता आणि जेवणाचे टेंडर 18 कोटी रुपयांचे आहे. ते देखील आपल्याला मिळाले आहे. कुंभमेळा फक्त 40 दिवसांचा आहे. त्यामुळे एवढा खर्च येत नाही. त्यामुळे त्यातून मोठे कमिशन मिळणार आहे. तुझ्या कुणी ओळखीचे लोक असतील तर त्यांनाही मॅनेज करुन टेंडर देऊयात. फक्त कुणाला सांगू नको म्हणावे, असे विलास लाड फोनद्वारे समोरच्या व्यक्तीला म्हणताना या क्लिपमध्ये ऐकू येत आहे. दिव्य मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
नांदेडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख निलंबित
नांदेड : प्रतिनिधी आरोग्य विभागासाठी आलेला करोड रुपयांचा निधी नियोजना अभावी व्यापकत झाला होता याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांना तडका फडके निलंबित केले आहे.. त्यांच्या कारभाराविषयी अनेक तक्रारी ही शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या यामुळे देशमुख यांचे विभागीय चौकशीही लावण्यात आले आहे. या कारवाईमुळे आरोग्य विभागात खळबळ […] The post नांदेडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख निलंबित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामती पोटनिवडणुकीत भाजपने मध्यस्थी करून निवडणूक बिनविरोध करावी, अशी स्थिती काँग्रेस पक्षाची नाही, असे स्पष्ट मत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले. काँग्रेस पक्ष मोठा असून, प्रदेश पातळीवरील नेत्यांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले. सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उभा केला आहे. हा निर्णय प्रदेश पातळीवर घेण्यात आला आहे. भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मध्यस्थी करत असल्याचे समजते. काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांच्या प्रचारात प्रदेश स्तरावरील सर्वजण सहभागी होतील, असेही पाटील यांनी नमूद केले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार जिल्हा काँग्रेस कमिट्या सक्षम करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या संघटन सृजन अभियान बाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक विनोद सुलतानपुरी (आमदार, हिमाचल प्रदेश), माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सतेज पाटील यांनी अभियानाबद्दल माहिती देताना सांगितले की, देशभरात हे अभियान राबविण्यात येत आहे. याद्वारे लोकांचा जनमानस जाणून घेतला जात आहे. 17 ते 19 एप्रिल दरम्यान पुणे जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आढावा घेतला जाईल. सर्वसमावेशक पदाधिकाऱ्यांना पक्षाची जबाबदारी देण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे. हे अभियान सात ते आठ राज्यांमध्ये यशस्वी झाले असून, आता ते महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. पक्षाचे निरीक्षक विविध पदाधिकाऱ्यांना एकटे भेटून चर्चा करणार आहेत. नावे शिफारस करण्याबाबत त्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. ज्यांना आपली भूमिका मांडायची आहे, त्यांनी पक्ष निरीक्षकांसमोर येऊन ती मांडावी, असे आवाहनही पाटील यांनी केले. यावेळी बोलताना विनोद सुलतानपुरी म्हणाले की, पुण्यातील विधी महाविद्यालयात माझे शिक्षण झाले असून, 20 वर्षांनी पुण्यात पुन्हा आल्याचा आनंद आहे. पुणे शहर ऐतिहासिक असून देशाला या शहराचे वेगळे महत्त्व आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी या अभियान माध्यमातून काम करण्यात येणार आहे.
पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांतील बांधकाम परवानग्यांच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या संदर्भात महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी नगरसेवकांनी नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव असीम गुप्ता यांना पत्र पाठवले आहे. पीएमआरडीएला 60 दिवसांसाठी बांधकाम परवानग्या देण्याचा शासनाचा निर्णय रद्द करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. हे पत्र माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे आणि नागरी हक्क संस्थेचे अध्यक्ष सुधीर कुलकर्णी यांनी दिले आहे. 30 जून 2021 रोजी 23 गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला होता. त्यानंतर या गावांचा विकास आराखडा तयार करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला होता. मात्र, 14 जुलै 2021 रोजी शासनाने पीएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, ती अद्याप प्रलंबित आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान,11 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाने पीएमआरडीएचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा रद्द केला. त्यानंतर पुणे महापालिका नियोजन प्राधिकरण म्हणून कार्यरत झाली. या प्रक्रियेत पीएमआरडीएकडील सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीने महापालिकेकडे वर्ग होणे अपेक्षित होते. मात्र, बांधकाम परवानग्यांसारख्या संवेदनशील विषयावर मार्गदर्शन मागत पीएमआरडीएने प्रस्ताव स्वतःकडेच ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, कायद्यात स्पष्ट तरतूद नसतानाही दोन महिन्यांसाठी पीएमआरडीएला बांधकाम परवानग्या देण्याची मुभा देण्यात आली आहे. अधिकार नसताना दिलेल्या या परवानग्या वैध ठरणार का, असा सवाल पत्रात उपस्थित करण्यात आला आहे. याशिवाय, पुणे महापालिकेने पाणीपुरवठ्याची पूर्ण व्यवस्था झाल्याशिवाय बांधकाम परवानगी न देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या धोरणाला छेद देणारे निर्णय भविष्यात महापालिकेवर अतिरिक्त ताण आणू शकतात, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे 60 दिवसांची मुदत रद्द करून सर्व प्रस्ताव तातडीने महापालिकेकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे. पीएमआरडीए आणि महापालिकेतील शुल्क संरचनेतील तफावतही यावेळी स्पष्ट करण्यात आली आहे. पीएमआरडीए रेडीरेकनरच्या 2 टक्के दराने विकास शुल्क आकारते, तर महापालिका 4 टक्के दराने शुल्क आकारते. या फरकामुळे होणारे आर्थिक नुकसान कोण भरून काढणार, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, पीएमआरडीएने कोणताही प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी महापालिकेच्या नगर अभियंत्यांशी समन्वय साधावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. शहरातील नियोजन प्रक्रियेत अधिक गोंधळ टाळण्यासाठी शासनाने यावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे महानगरपालिकेकडून शहरातील ओव्हरहेड केबल्सवर सुरू असलेल्या कारवाईमुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी, व्यावसायिक आणि स्टार्टअप्सचे दैनंदिन कामकाज ठप्प होत आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाने आज पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन ही कारवाई तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे. शहराच्या डिजिटल प्रगतीवर या कारवाईचा गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पुणे शहर शिक्षण, आयटी आणि उद्योग क्षेत्रात देशात आघाडीवर आहे. अशा स्थितीत नियोजनशून्य आणि एकतर्फी कारवाई शहराच्या प्रतिमेला धक्का पोहोचवू शकते, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. केंद्र सरकारच्या 'डिजिटल इंडिया' उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट ही एक अत्यावश्यक सेवा बनली असून, त्यात अडथळे निर्माण होणे चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे, तसेच प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. निवेदनात प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ओव्हरहेड केबल्स संदर्भात स्पष्ट आणि पारदर्शक नियमावली तात्काळ तयार करावी, नियमावली लागू होईपर्यंत सध्या सुरू असलेली कारवाई स्थगित करावी, लहान व मध्यम इंटरनेट सेवा पुरवठादारांसाठी सुलभ परवाना प्रक्रिया राबवावी आणि कारवाईमागील हितसंबंध सार्वजनिक करून सर्व कंपन्यांवर समान निकषांनुसार पारदर्शक कारवाई करावी, यांचा समावेश आहे. यावेळी प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, इंटरनेट ही आजच्या काळातील अत्यावश्यक सेवा आहे. कोणतीही प्राथमिक उपाययोजना किंवा स्पष्ट नियमावली नसताना अशा प्रकारची कारवाई करणे योग्य नाही. प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने समन्वय साधून ठोस आणि लोकहिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.'स्मार्ट सिटी'च्या दिशेने वाटचाल करताना नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करूनच धोरणे आखली पाहिजेत, अन्यथा विकास प्रक्रियेलाच अडथळा निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबईत केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधातील चौकशीप्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) उच्च न्यायालयात स्पष्ट केले की, वानखेडे यांनी तपास केलेल्या दोन प्रकरणांतील कथित अनियमिततेची चौकशी ही निनावी तक्रारींच्या आधारे सुरू करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झालेली नसल्याचा दावा एनसीबीने ठामपणे केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील राजकीय आरोपांना नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठासमोर झाली. सुनावणीदरम्यान एनसीबीने आपली भूमिका स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात वानखेडे यांनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. दुसरीकडे, वानखेडे यांच्यावतीने वरिष्ठ वकील राजीव चव्हाण यांनी उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. न्यायालयाने ही विनंती मान्य करत पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली आहे. एनसीबीच्या प्रतिज्ञापत्रानुसार, वानखेडे यांनी तपास केलेल्या दोन प्रकरणांमध्ये अनियमिततेबाबत दोन स्वतंत्र आणि निनावी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारेच प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली. या प्रक्रियेत नवाब मलिक किंवा त्यांच्या कोणत्याही सूचनेचा संबंध नसल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे. तसेच, अशा तक्रारींची पडताळणी करून त्यावर कारवाई करण्याचा अधिकार तपास यंत्रणेला असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, एनसीबीने आणखी एक गंभीर आरोप केला आहे. वानखेडे यांनी 2024 पासून विविध याचिका आणि कायदेशीर प्रक्रिया वापरून चौकशीला विलंब करण्याचा प्रयत्न केला असल्याचे एनसीबीने म्हटले आहे. तपास प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्यासाठी कायदेशीर मार्गांचा वापर केल्याचा दावा एनसीबीने आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील वाद अधिकच तीव्र झाला आहे. दरम्यान, एनसीबीने वानखेडे यांच्याविरोधातील चौकशी अद्याप प्राथमिक टप्प्यात असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यांना आपली बाजू मांडण्याची पूर्ण आणि निष्पक्ष संधी दिली जाईल, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. चौकशीसाठी नोटीस देण्यात येणे ही नियमित प्रक्रिया असल्याचे सांगत एनसीबीने आपली कारवाई योग्य असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणाचा अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्याशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरण आणि एका नायजेरियन नागरिकाच्या अटकेशी संबंधित तपासात अनियमितता झाल्याच्या तक्रारींमध्ये आहे. या संदर्भात एनसीबीकडे निनावी तक्रारी दाखल झाल्यानंतर वानखेडे यांच्याविरोधात प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली. त्यानुसार नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 दरम्यान त्यांना विशेष पथकासमोर उपस्थित राहण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष मात्र, वानखेडे यांनी या कारवाईला विरोध करत ही चौकशी सूडबुद्धीने सुरू करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला की, अमलीपदार्थ प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयावर कारवाई केल्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता एनसीबीच्या प्रतिज्ञापत्रामुळे या प्रकरणात नवा टप्पा निर्माण झाला असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या एका कार्यक्रमात दिवंगत अजित पवार यांचा फोटो नसल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या प्रकरणी टीकेची झोड उठवत त्यांच्यावर त्यांच्या कथित कृतघ्नपणाचा निषेध केला आहे. या कृतीद्वारे प्रफुल्ल पटेल यांचे पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसत आहेत, असे शरद पवार गटाने म्हटले आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहेत. त्यातच सुनील तटकरे यांच्या रायगड येथील एका कार्यक्रमातील बॅनरवर अजित पवारांचा फोटो नव्हता. त्यामुळे शरद पवार गटाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता असाच काहीसा प्रकार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत घडला आहे. त्यांच्याही कार्यक्रमात अजित पवार यांचा फोटो नसल्याचे निदर्शनास आले आहे. पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे दिसताहेत शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी या प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, रायगड मध्ये तटकरेंना जशी अजितदादांची अडचण तशीच आता पटेलांच्या विदर्भात तिरोडा येथील NCP पक्षाच्या अधिकृत बैठकीतील बॅनरवर अजित पवार यांचा फोटो नाहीच. फक्त स्वतःचे फोटो लावणाऱ्या पटेल तटकरे या दोन्ही नेत्यांनी दाखवून दिले की आम्ही तुमचे नसून स्वतंत्र आहोत. पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसत आहेत. प्रफुल्ल पटेल साहेब तुमच्या कृतघ्नपणाचा निषेध ! मात्र स्वतःला अजितदादा प्रेमी म्हणवणारे त्यांच्या पक्षातील आमदार व पक्ष पदाधिकारी गप्प बसत असतील तर ते गुलाम असावेत किंवा ढोंगी असावेत. राम कृष्ण हरी, असे लवांडे यांनी म्हटले आहे. अमोल मिटकरींचाही शरद पवार गटाच्या सूरात सूर दुसरीकडे, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणी अप्रत्यक्षपणे सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. ते एका पोस्टद्वारे म्हणाले, आदरणीय अजितदादा तुम्ही कुण्या बॅनरवर नसला काय असला काय? प्रसिद्धीचा तुम्हाला हव्यास होताच कुठे? तुम्ही मात्र गरिबांच्या घराघरात कायम आहात.. कोकण ते विदर्भापर्यंत तुमचा चाहता वर्ग विखुरलाय ..कदाचित तो तुम्हाला भेटलाही नसेल आयुष्यात कधी…. किंवा त्याला तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नसेल. मात्र तो फाटका असला तरी देवासमान पुजतो तुम्हाला … कारण तो जाणत होता की तुम्ही महाराष्ट्राची गरज होता….तो फाटका, गरीब, पिचलेला, रडतोय आजही तुमच्यासाठी धाय मोकलून… कदाचित तुम्ही त्याला दिसणार नाही, आणि तो ही आता परत हसणार नाही… तुम्ही व तुमचे फोटो कायमचे कोरून गेलेत त्याच्या काळजात… तुम्ही बॅनर वर नसलात म्हणून काय झालं?? एकदिवस अबाल वृद्ध इथला डोंगर हलवतील ,आणी स्वाभिमानाने म्हणतील “आमच्याकडे बॅनर छापायला पैसे नसतील पण दादा तुमच्या बॅनर पेक्षा आमच्या काळजात कायम दिसतील.. तुमच बॅनर उद्या खतावर ,छतावर राहील ,पण आमच्या काळजातलं दादा आम्ही सरणावर जाईस्तो आमच्या फाटक्या हृदयात कायम राहील. घराघरात दादा मनामनात दादा, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. रोहित पवारांनी तटकरेंवर साधला होता निशाणा राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ नुकताच रायगडमध्ये झाला होता. या कार्यक्रमाला सुनील तटकरे उपस्थित होते. पण या कार्यक्रमाच्या बॅनवर अजित पवार व सुनेत्रा पवार यांचे फोटो नव्हते. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी सुनील तटकरेंवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, “मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदारच जमिनीचा ७/१२ स्वतःच्या नावे करतो, याचं जिवंत उदाहरण…. जे आम्ही वारंवार बोलतोय…”
गेली 3 ते 4 दिवसांमध्ये नांदेडमध्ये ज्या खुनाच्या घटना घडल्या आहेत त्या अत्यंत वाईट आहेत. नांदेड शहरामध्ये अवैध हत्यारे आली आहेत. नांदेडमधील अनेक गुन्हेगार हे गुन्हे करतात आणि तेलंगणा किंवा कर्नाटकात पळून जातात, असे शिवसेना नेते हेमंत पाटील यांनी म्हटले आहे. नांदेडमध्ये गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही असे म्हणत पाटील यांनी गृहविभागाच्या कामावरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हेमंत पाटील म्हणाले की, नांदेड शहरात जर झडती घेतली गेली तर अवैध दीड ते 2 हजार पिस्तूलं सापडतील. त्यामुळे कोणाचाच वचक शहरावर राहिलेला नाही. बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो. त्यांना व्याजाने पैसे दिले जातात, त्यांचे लॅपटॉप आणि इतर वस्तु हिसकावल्या जातात. यामुळे नांदेडमध्ये पोलिस आयुक्तालय झाले पाहिजे. पोलिसांच्या सिंघम अशा प्रतिमा रंगावल्या जातात पण ते केवळ तोडपाणी करण्यात पुढे असतात, असा आरोप पाटील यांनी केला आहे. गुन्हेगारांना राजाश्रय देऊ नये हेमंत पाटील म्हणाले की, मुलींची छेडछाड, बलात्कार, चोरी असे गुन्हे दाखल असणाऱ्यांना कोणीही राजाश्रय देऊ नये. मध्यतंरी शहरातील व्यापाऱ्यांकडून शेकडो कोटी रुपयांच्या खंडण्या जमा उकळण्यात आल्या. त्यामुळे अनेक व्यापारी शहर सोडून गेले. सर्व पक्षीय लोकांनी गुन्हेगारांना राजाश्रय देऊ नये. सरकारी रुग्णालयात पोलिसांसमोर जर हत्या होत असेल तर असे पोलिस दल काय कामाचे. जे पोलिस तिथे उपस्थित होते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हेमंत पाटील यांनी केली आहे. कागदावर काम करणाऱ्यांवर कारवाई व्हावी हेमंत पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या 23 कोटी रुपये निधी परत जातो याला कोण जबाबदार आहे. मोठे अधिकारी छोट्या अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवतात. त्याचा तपास झाला पाहिजे. शहरात मोठ्या प्रमाणात निधी आला तर तो कामासाठी असतो केवळ कागदावर कामे होत असतील तर कारवाई झाली पाहिजे.
राज्यात गुन्हेगारी चांगलीच फोफावली आहे. त्यात खून, खंडणी तसेच मुली बेपत्ता होण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. मुलींच्या तसेच महिलांच्या अपहरणाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत देखील मांडला होता. आता असाच बेपत्ता होण्याचा प्रकार बीडमध्ये झाला आहे. मात्र, यात वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे. बीडच्या माजलगाव शहरातील एक तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या शोधत एक पोलिस कर्मचारी पुण्यात आला होता. तपास पूर्ण केल्यानंतर तो परत बीडला गेला आणि मध्यरात्री 2 वाजता त्याने आपले आयुष्य संपवले. आता पुण्यात नेमके असे काय घडले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले 35 वर्षीय पोलिस कर्मचारी बाळकृष्ण जायभाये यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील एका बेपत्ता मुलीच्या तपासासाठी पुणे येथे गेलेले जायभाये हे संबंधित तपास आणि काम व्यवस्थित पूर्ण करून रात्री उशिरा घरी परतले होते. मात्र त्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांनी ही आत्महत्या का केली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुण्यावरून तपास पूर्ण करून परतल्यानंतर अवघ्या काही वेळातच, पहाटे दोनच्या सुमारास त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून, त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळताच परिसरात मोठी गर्दी जमली होती. या हृदयद्रावक घटनेमुळे पोलिस दलातील त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा मानसिक धक्का बसला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पुण्यात नेमके काय झाले? बेपत्ता झालेल्या मुलीच्या शोधात गेलेले पोलिस कर्मचारी बाळकृष्ण जायभाये यांच्यासोबत पुण्यात नेमके काय झाले? असा सवाल उपस्थित होत आहे. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही सुसाईड नोट अद्याप मिळालेली नाही, त्यामुळे आत्महत्येचे गूढ वाढले आहे. आता पोलिसांनी बाळकृष्ण जायभाये यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे विचारपूस सुरू केली आहे. या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. 17 वर्षीय विवाहित अल्पवयीन मुलीचा मृतदेह दरम्यान, बीड जिल्ह्यातून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका 17 वर्षीय विवाहित अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. या मुलीचा विवाह अवघ्या एक वर्षापूर्वी झाला होता आणि लग्नानंतरचे सुरुवातीचे सहा महिने ती सासरी वास्तव्यास होती, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली असून या प्रकरणातील गुंतागुंत पाहता पोलिस अधिक तपास करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत राहण्याचा अधिकार आहे का नाही हे सांगण्याचा अधिकार राऊतांना नाही. तुम्ही राज्यसभेवर कसे निवडून आलात. तुमच्याकडे केवळ 20 आमदार आहेत, तुमचे उमेदवार निवडून येतात का हे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनता निवडून देते आहे,असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. तुम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना घरातून बाहेर निघण्याचा सल्ला द्या. राऊत हे भोंदू बाबा राऊत आहात. नवनाथ बन म्हणाले की, भारताची परिस्थिती उंदरासारखी झालेली नाही तर राऊतांची परिस्थिती सापासारखी झाली आहे. साप जसे आपलेच दुध पितो आणि फना वर काढून बसतो तसेच देशाचे मीठ खात देशाविरोधात फना काढण्याचे काम संजय राऊत करत आहेत. तुम्ही आपल्याच देशाविरोधी भूमिका घेत पाकिस्तानचे समर्थन करत आहात. तुम्ही पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करण्याचे काम करत आहात. पाकिस्तान अन् उबाठाची अवस्था सारखीच नवनाथ बन म्हणाले की, ज्या पाकिस्तानचे गुणगाण संजय राऊत गात आहे त्या देशामध्ये लोकांना पीठ मिळत नाही. पेट्रोल-डिझेल महाग आहे, गॅस मिळत नाही. साडेचारशे रुपयांनी पेट्रोल डिझेल मिळते. आपल्याकडे भाव वाढले नाही कारण मोदींचे नेतृत्व सक्षम आहे. संजय राऊत तुमच्या पाकिस्तानची अवस्था महाराष्ट्रात उबाठाची अवस्थेसारखी झाली आहे. दलाली करणे भारताचा धंदा नाही नवनाथ बन म्हणाले की, ज्यांच्या पक्षाची धाव आणि मजल उरणपर्यंत नाही असे संजय राऊत इराणच्या गप्पा मारत आहेत. इराण प्रकरणी काय करायला हवे होते यांचा सल्ला देतात त्यांनी उबाठामध्ये लक्ष दिले पाहिजे. देशाचा विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. इराण-इस्रायल युद्धात काय झाले कुणी मध्यस्थी करायला हवी होती? कोणी दलाली केली हे जगाने पाहिले आहे. दलाली करणे भारताचा धंदा नाही. जे दलाली करतात आणि भारतात त्यांची प्रवक्तेगिरी करणाऱ्यांना दलाली लखलाभ असो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सक्षम आहे, म्हणून या युद्धाची झळ आपल्याला पोहोचली नाही. राऊतांचा दलालीचा धंदा नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत तुमच्या उबाठा पक्षाची काय अवस्था झाली आहे याकडे तुम्ही लक्ष द्या. मनपामध्ये उद्धव ठाकरेंची काय अवस्था झाली याकडे लक्ष द्या. उरणपर्यंत पक्ष नसलेल्या लोकांनी इराणच्या गप्पा मारणे बंद केले पाहिजे. इराण-इस्रायल युद्धात ज्या पद्धतीने पाकिस्तानकडून दलाली करण्याचे काम केले जात आहे आणि पाकिस्तानची दलाली भारतात करण्याचे काम संजय राऊत करत आहेत. राऊत यांचा दलाली करण्याचा धंदा झाला आहे. पक्षामध्ये त्यांना काही काम उरलेले नसल्याने ते काही वेळ शरद पवार यांची दलाली करतात काही वेळ राहुल गांधी यांची दलाली करतात. आज तर त्यांच्याकडून पाकिस्तानचा उदोउदो केला जात आहे. हे दलालीचे धंदे बंद करा, यामुळेच तुमच्यावर ही पाळी आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांची प्रकृती आज अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आलेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सुषमा अंधारे यांची प्रकृती आज सकाळी अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली आहे. सुषमा अंधारे यांना नेमके काय झाले? हे अद्याप समजले नाही. पण त्यांच्या समर्थकांकडून त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जात आहे. विधिमंडळ हक्क समितीच्या बैठकीला राहणार गैरहजर उल्लेखनीय बाब म्हणजे सुषमा अंधारे उद्या गुरुवारी विधिमंडळ हक्क समितीच्या बैठकीला हजर राहणार होत्या. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आता या बैठकीला हजर राहता येणार नाही. यासंबंधीची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून थेट विधिमंडळ सचिवालयाला पत्राद्वारे कळवण्यात येणार आहे. सुषमा अंधारे ह्या शिवसेना ठाकरे गटाच्या एक प्रमुख महिला नेत्या आहेत. आपल्या धारदार वक्तृत्वशैलीमुळे व विरोधकांवर थेट तिखट हल्ला चढवण्याच्या आपल्या खास शैलीमुळे त्या ओळखल्या जातात. त्या ठाकरे गटाच्या मुलूख मैदानी तोफ म्हणूनही ओळखल्या जातात. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी सुषमा अंधारे यांनी सामाजिक आणि प्रबोधनपर कामांमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता आणि महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला. विविध सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घेत त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृतीचेही काम केले. राष्ट्र सेवा दल आणि इतर प्रबोधनवादी विचारसरणीच्या संस्थांशीही त्यांचा संबंध आहे. तर्कवादी आणि प्रगतिशील विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक व्याख्याने दिली व मोहिमा राबवल्या. भोंदू खरातवरून अंजली दमानियांवर साधला होता निशाणा दुसरीकडे, सुषमा अंधारे यांनी परवाच भोंदू अशोक खरातच्या मुद्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या, अंजली दमानिया, तुम्ही आज रडून जे victim कार्ड खेळलं ते कमालीचं बालिश होतं. पण मूळ मुद्दा भरकटू नये म्हणून आज मी तुमच्यावर कमी फोकस केला आहे. कारण तुमच्याशी वितंड वादापेक्षाही खरात आणि सर्व गुन्हेगार गजाआड होणे जास्त गरजेचे आहे. पण माझ्या कुठल्याही आरोपाचा खंडन तुम्ही आजही करू शकलेला नाहीत. तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवणार होतात पण तुम्ही ते करून दाखवू शकला नाहीत. तुम्ही सगळीकडून अडचणीत आलेल्या आहात याची मला कल्पना आहे. कारण तुम्ही केलेली कृती breach of privacy आहे. पण तुम्ही रडल्याने आणि अमृता फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याने माझं म्हणणं सिद्ध व्हायला अधिक मदत झाली. आभार. बाकी भाजप सोडून मुद्दे असतील तर तुम्ही जगात कुठेही असला तर प्रकट होतात यावर माझा विश्वास आहे जशा कोरेगाव पार्क प्रकरणात तुम्ही अमेरिकेतून अचानक लाईव आला होता अगदी तशा... ! तुम्ही कुणाठी काम करता हे तुम्ही आज स्वतःच्या कृतीतून सिद्ध केला आहे आणि तुम्हाला सीडीआर कसे मिळाले यावर तुम्ही जे दोन वेगवेगळे स्टेटमेंट तुम्ही खोटं बोलत आहात हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत. लवकर खासदार व्हा, असे त्या म्हणाल्या होत्या.
मुंबईत शिखर बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नवे कायदेशीर वळण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी या प्रकरणात दोषमुक्तीची मागणी करत विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र, या अर्जावर केवळ तांत्रिक मुद्द्यांवर नव्हे तर प्रकरणाच्या गुणवत्तेच्या आधारे निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट मागणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयासमोर केली आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या मूळ गुन्ह्याचा तपास बंद करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा अहवाल सादर केला होता, जो विशेष न्यायालयाने स्वीकारला. याच मुद्द्यावर आधार घेत रोहित पवार आणि इतर 11 जणांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे. त्यांचा दावा आहे की, मूळ गुन्हाच बंद झाल्याने त्यावर आधारित ईडीचे प्रकरण टिकू शकत नाही. मात्र, ईडीने या युक्तिवादाला विरोध करत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. कनिष्ठ न्यायालयाने अहवाल स्वीकारला असला तरी, ईडीने यापूर्वी दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जाबाबतचा निर्णय उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आला असून तो अजून प्रलंबित आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना सर्व बाबींचा सखोल विचार करणे आवश्यक असल्याचे ईडीने नमूद केले आहे. फक्त प्रक्रियात्मक कारणांवर आरोपींना दिलासा देऊ नये, असेही ईडीने स्पष्ट केले. ईडीच्या आरोपांनुसार, कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. हा कारखाना रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो लिमिटेडशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कारखान्यावर सुमारे 80.56 कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते. हे कर्ज वसूल करण्यासाठी शिखर बँकेने 13 जुलै 2009 रोजी सरफेसी कायद्याअंतर्गत कारवाई करत मालमत्ता ताब्यात घेतली होती. यानंतर 30 ऑगस्ट 2012 रोजी या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. मात्र, ईडीच्या मते हा लिलाव प्रक्रियेत अनियमितता करून करण्यात आला. एका कथित मूल्यांकन अहवालाच्या आधारे कारखान्याची किंमत कमी दाखवण्यात आली. बोली प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्वाधिक बोलीदाराला तांत्रिक कारणांवर अपात्र ठरवण्यात आले, तर दुसऱ्या बोलीदाराचा बारामती अॅग्रो लिमिटेडशी संबंध असल्याचा आरोप आहे. तसेच त्या बोलीदाराकडे साखर कारखाना चालवण्याचा अनुभव किंवा आर्थिक क्षमता नसल्याचेही ईडीने नमूद केले आहे. न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार या सर्व पार्श्वभूमीवर आता न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. रोहित पवार आणि इतर आरोपींना दिलासा मिळणार की ईडीच्या भूमिकेमुळे त्यांच्यावरचे आरोप कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
इराण-इस्रायल युद्धामध्ये दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले. यात ट्रम्प सारख्या झुंड राष्ट्रप्रमुखाला धडा शिकवण्यात आले. पण शेवटी युद्धात मध्यस्थी करण्याचे श्रेय पाकिस्तानला जात आहे. चीन तर मोठा देश आहे पण पाकिस्तानला श्रेय मिळाल्याने तो देश जगाच्या नकाशावर पु्न्हा एकदा आला आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. हे श्रेय नरेंद्र मोदी आणि भारताला मिळायला हवे होते. महाविश्वगुरूंना हे श्रेय का मिळाले नाही तर त्यांची कोणतीच भूमिका नाही. जगात युद्ध सुरू असताना महाविश्वगुरू हे राजकीय विरोधकांवर प्रचार सभांमधून शाब्दिक बॉम्ब टाकत आहेत. संजय राऊत म्हणाले की, इराण-इस्रायल युद्ध हे संपूर्ण जगाचा विध्वंस होईल असे सुरू होते, यात हजारो लोक मारले गेले. अखाती राष्ट्रातील अनेक ठिकाणी शेकडो लोकं मारले गेले. पण इराणसारखा देश इस्रायल-अमेरिकेसारख्या महाशक्तीला शरण गेला नाही. 35 दिवसांपेक्षा जास्त काळ त्यांच्यासोबत युद्ध केले. अमेरिकेबद्दल जगाच्या मनात जी भीती होती ती भीती इराणने मोडून काढली. देशासाठी कसं लढावं हे इराणनं जगाला दाखवून दिले, राज्यकर्त्यांनी देशासाठी कसे बलिदान द्यावे, जनतेने कसे बलिदान द्यावे हे इराणने जगाला दाखवले आहे. ट्रम्प यांची भारताला चपराक संजय राऊत म्हणाले की, शांती बैठक इस्लामाबादमध्ये होणार आहे. जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये ताब्यात घेणार होतात तिथे तुम्ही भाजपचा झेंडा फडकवणार होतात. तिथे ट्रम्प, नेत्यन्याहू आणि इराणचे राज्यकर्ते एकत्र येत शांततेवर चर्चा करणार आहेत.भारतासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. तुम्ही कसले विश्वगुरू आहात? तुम्ही भंपक आणि डरपोक आहात. ही ट्रम्प यांनी भारताला मारलेली चपराक आहे. कारण ते चीन आणि पाकिस्तानला थॅक्यू म्हणत आहेत. मोदींना आता सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. जयशंकर यांनी राजीनामा दिला पाहिजे संजय राऊत म्हणाले की, मोदींमुळे भारताची अवस्था ही डरपोक उंदरासारखी झाली आहे.इतक्या मोठ्या घडामोडी आशिया खंडात घडत असताना मोदींनी काय केले तर टेलिफोन ऑपरेटरचे काम केले. केवळ लोकांशी फोनवर बोलण्याचे काम त्यांनी केले. पाकिस्तानला श्रेय दिले यावर तरी बोलले पाहिजे. जयशंकर यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही आपल्या शत्रूला कमी लेखत आहात. अजित पवार हे काँग्रेसचे प्रोडक्शन संजय राऊत म्हणाले की, जनभावना काय हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावे. पंढरपूर, नांदेडमध्ये जनभावना नव्हती का? तेव्हा भाजपने ती जनभावना पायी तुडवली याचे उदाहरण देऊ शकतो. पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केल्यावर त्यांच्यावर टीका होणारच.अजित पवार हे काँग्रेसचे प्रोडक्शन आहे. शरद पवारांची संपूर्ण हयात काँग्रेसमध्ये गेली. काँग्रेस पक्षाचे देशासाठी मोठे योगदान. महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांना जगभरात प्रतिष्ठा आहे. काँग्रेसचा पराभव झाला तर लोकशाही मरत नाही. काँग्रेसला 25 मते पडतील तुम्हाला 25 लाख मते पडतील. पण विरोध झाला पाहिजे.
चौकशीचा फास आवळताच अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला:आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार
नाशिकमध्ये अटक करण्यात आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. अटकेनंतर सुरुवातीला पोलिसांशी उद्धटपणे वागणारा आणि त्यांनाच उलट शाप देण्याचा प्रयत्न करणारा खरात आता पूर्णपणे खचल्याचे चित्र दिसत आहे. तुम्ही पाप करत आहात, तुमच्यावर कोप होईल, अशा शब्दांत पोलिसांना घाबरवण्याचा प्रयत्न करणारा हा भोंदू बाबा आता कोठडीत शांत झाला असून, त्याचा सगळा आव उतरल्याची माहिती समोर आली आहे. अटक झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात अशोक खरात अतिशय आत्मविश्वासाने वागत होता. आपल्या मागे मोठे राजकीय पाठबळ असल्याचा त्याला विश्वास होता. त्यामुळे तो एसआयटी अधिकाऱ्यांशीही वाद घालत होता. मात्र, तपासाचा फास हळूहळू आवळला जाऊ लागल्यानंतर आणि सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर त्याचा आत्मविश्वास ढासळला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव होताच तो आता नरम पडला असून, दोन-तीन वेळा कोठडीत रडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, अशोक खरातला आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने पुढील कारवाईसाठी ही सुनावणी होणार आहे. आतापर्यंत दाखल झालेल्या 12 गुन्ह्यांपैकी एका प्रकरणात त्याला सात दिवसांची कोठडी देण्यात आली होती. एका पीडित महिलेसोबत अत्याचार करून तिला गर्भवती केल्यानंतर गर्भपात केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याची मागणी एसआयटीने केली आहे. तपासादरम्यान आणखी 11 महिलांनी पुढे येत खरातविरुद्ध तक्रारी नोंदवल्या आहेत. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी तो त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याची भीती दाखवत असे. तुझ्या पतीला किंवा मुलाला काहीतरी होईल, असे सांगून तो मानसिक दबाव निर्माण करायचा. त्यानंतर धार्मिक विधी, ऊर्जा उपचार आणि शरीरशांतीच्या नावाखाली त्यांचे शारीरिक शोषण केल्याचे आरोप समोर आले आहेत. काही महिलांची मालमत्ता आणि जमीनही त्याने धमकावून बळकावल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. खरातच्या अडचणींमध्ये मोठी वाढ या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. हेल्पलाइनवर येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची काळजीपूर्वक छाननी केली जात असून, पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई सुरू आहे. सध्या अशोक खरातविरुद्ध एकूण 12 गुन्हे दाखल असून, त्यामध्ये 8 महिला अत्याचार आणि 4 फसवणुकीचे गुन्हे आहेत. या सर्व प्रकरणांमुळे खरातच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली असून, त्याचं भवितव्य अधिकच कठीण होत चालल्याचं दिसून येत आहे.
महापालिका निवडणुकीपासून उद्धवसेनेतील एका गटाने जिल्हा प्रमुख प्रा. अजय दासरी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. ‘बजाओ बासरी... हटाओ दासरी...’ अशी मोहीम सुरू केली होती. त्यात त्यांना अखेर यश मिळाले आहे. पक्षाने आता जिल्हाप्रमुख पदावरून दासरी यांना डच्चू दिला आहे. त्यांच्याकडील जबाबदारी प्रताप चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. उद्धवसेनेच्या संपर्क प्रमुख प्रा. सुषमा अंधारे यांनी बैठक घेऊन नवीन कार्यकारिणी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार नव्या कार्यकारिणी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध झाली आहे. प्रा. दासरी यांच्याकडील शहर उत्तर व शहर मध्यच्या जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आता माजी शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दक्षिण, अक्कलकोटच्या जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी शरणराज केंगनाळकर यांच्याकडे तर सोलापूर महानगर प्रमुखपदी महेश धाराशिवकर यांची निवड झाली. लोकसभा प्रमुखपदी संजय पौळ यांची वर्णी जिल्हाप्रमुख - धनंजय डिकोळे (माढा, करमाळा), संभाजी शिंदे (सांगोला, पंढरपूर - मंगळवेढा), प्रताप चव्हाण (सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य), शरणराज केंगनाळकर (अक्कलकोट, दक्षिण सोलापूर), प्रवीण काकडे (बार्शी, मोहोळ, माळशिरस). लोकसभा प्रमुख - संजय पौळ (सोलापूर लोकसभा), हुकुमचंद राठोड (माढा लोकसभा), सोलापूर महानगरप्रमुख - महेश धाराशिवकर, सोलापूर महिला संघटिका - मंगल थोरात. विचित्र लोकांसोबत काम करणारच नाही जिल्हा प्रमुख हे महत्त्वाचे आणि पक्षप्रमुखांच्या जवळील पद आहे, अशा पदावरील व्यक्तीवर खालच्या पातळीवर आरोप करण्यात आले. पक्षासाठी प्रामाणिक काम करत असतानाही त्रास दिला. तरीही आपण पक्षासाठी काम केले. ज्यांनी पक्षप्रमुखांवर आरोप केले त्यांनाच पदे मिळाली याचे आश्चर्य आहे. यापुढील काळात या विचित्र लोकांत काम करण्याची मानसिकता नाही. पुढे पक्ष जी जबाबदारी देईल. ती पार पाडणार आहे. आता बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसैनिकांसोबत काम करणार आहे. प्रा. अजय दासरी, माजी जिल्हा प्रमुख.
वृक्षतोडीच्या मुद्यावरून पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेले असतानाच महापालिकेच्या उद्यान विभागाचा गलथान कारभारही समोर आला आहे. महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम 1975 नुसार दर 5 वर्षांनी वृक्षगणना करणे बंधनकारक आहे. पालिकेने 2018 नंतर अद्याप नव्या वृक्षगणनेचा अहवालच जाहीर केलेला नाही. विशेष म्हणजे, 2024 मध्ये 8 कोटी रुपये खर्चून नवीन गणनेचे काम सुरू करण्यात आले होते. तरी, मात्र 8 वर्षांपासून शहराच्या हरितसंपदेची नेमकी स्थिती काय, हे उद्यान विभागाने समोरच आणलेले नाही. 2017-18 मध्ये झालेल्या वृक्षगणनेत शहरात 47,95,387 झाडे आढळली होती. यात 257 प्रजातींची नोंद झाली होती. मात्र, यात चिंतेची बाब म्हणजे 45 टक्के झाडे ही विदेशी गिरिपुष्प (ग्लीरिसिडीया) प्रजातीची होती. त्याशिवाय बाभूळ 18 टक्के आणि सुबाभूळ 13 टक्के असे प्रमाण होते. तेव्हाच्या अहवालात एकूण 1528 वारसा वृक्षांची नोंद करण्यात आली होती, ज्यात पिंपळ, वड आणि आंब्याचा समावेश होता. मात्र, गेल्या 7 वर्षांत या शिफारशींवर नक्की काय कार्यवाही झाली आणि किती नवीन झाडे लावली गेली, याबाबत पर्यावरणप्रेमींनी सवाल उपस्थित केला आहे. जिओ-टॅगिंग प्रणालीचा वापर करून वृक्षांच्या आरोग्याची नोंद ठेवण्याचे दावे केले जात असले तरी, प्रत्यक्षात अहवालच नसल्याने पालिकेच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिकारी : न्यायालयासमोर वृक्षतोड, पुर्नरोपणाचे वास्तव मांडू रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांमुळे आतापर्यंत 35 हून अधिक नागरिकांचा बळी गेलेला आहे. आम्ही रस्त्यातील धोकादायक व रुंदीकरणाला अडथळा ठरणारी जुनी वृक्षे काढून त्यांचे दुसऱ्या जागेत पुर्नरोपण करत आहोत. हरित लवादाने स्थगिती दिल्याने आता न्यायालयासमोर परिस्थिती मांडणार आहोत. लेखी आदेश दुपारपर्यंत तरी मिळालेले नव्हते. दुसरे म्हणजे वृक्षगणनेचा आदेशही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. - विवेक भदाणे, उद्यान अधिक्षक मनपा, नाशिक याचिकाकर्ते : अधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करु राष्ट्रीय हरित लवादाने मंगळवारी दुपारी 11:45 वाजता स्पष्ट आदेश दिले होते. 28 एप्रिलपर्यंत या वृक्षतोडीला पूर्णपणे स्थगिती देण्यात आली होती. मुळात या वृक्षतोडीला उच्च न्यायालयाने यापूर्वीच स्थगिती दिलेली आहे. तरीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या नियमांची पायमल्ली केली. हे कृत्य निव्वळ बेजबाबदारपणाचे नसून, न्यायालयाचा अवमान करणारे आहे. पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या आणि न्यायालयाचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्याला न्यायालयात खेचणार आहे. -ॲड. श्रीराम पिंगळे, याचिकाकर्ते पालिकेवर होऊ शकते दंडात्मक कारवाई हरित लवादाने दिलेल्या आदेशाला न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच महत्त्व असते. त्यातही अशा दाव्यांमध्ये जर वकील उपस्थित असतील तर त्यांनी तत्काळ आपल्या आशीलाला सदर आदेशाची माहिती देणे महत्त्वाचे असते. जर सरकारी विभागाकडून किंवा अधिकाऱ्याकडून आदेशाचे उल्लंघन झाले, तर संबंधित विभागप्रमुखावर कारवाई केली जाते. त्यांना न्यायालयात उत्तर द्यावे लागते आणि वैयक्तिकरित्या दोषी धरले जाऊ शकते. दंडात्कम कारवाई देखील होऊ शकते. दिव्य मराठी एक्स्पर्ट ॲड. रवींद्र निकम, विशेष सरकारी वकील हरित लवादाचा लेखी आदेशच वैध राष्ट्रीय हरित लवादाने आदेश दिल्यानंतर त्याबाबतचे लेखी आदेश महापालिकेला प्राप्त होणे गरजेचे आहे. लेखी आदेशच वैध मानला जातो. मात्र, जर त्या ठिकाणी पालिकेची बाजू मांडणारे वकील उपस्थित असतील तर लवादाने दिलेल्या स्थगितीबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती द्यायला पाहिजे होती. वृक्षलागवड वाऱ्यावर 2017-18 मध्ये झालेल्या वृक्षगणना अहवालात शहरात नैसर्गिक साखळी समृद्ध करण्यासाठी बहावा, वड, पळस, अर्जुन, कदंब आणि करंज यांसारख्या स्थानिक वृक्षांच्या लागवडीची शिफारस करण्यात आली होती. गुन्हा दाखल करण्याची धमकी झाडे तोडणे थांबवले असले तरी तणाव निवळलेला नाही. उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी आक्रमक पवित्रा घेत, दुपारी 4 वाजेपर्यंत स्थगितीची अधिकृत ऑर्डर न दाखवल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करू, अशी धमकीच वृक्षप्रेमींना दिल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे. वृक्षगणनेची आठ वर्षांपासून प्रतीक्षाच पर्यावरणप्रेमी श्रीराम पिंगळे यांनी हरित लवादात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (दि. 6) सुनावणी होणार होती. मात्र, सोमवार सकाळपासूनच महापालिकेने जुन्या, डेरेदार वृक्षांचा बळी घेणे सुरू केले. ही सुनावणी मंगळवारवर (दि. 7) गेल्याने पालिकेला आणखीच वेळ मिळाला आणि सुनवाणीपर्यंत पालिकेने तब्बल 22 झाडांचा बळी घेतला. या कामादरम्यान सोमवारी झाडे तोडण्याला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमी आणि रस्त्याच्या मध्यावरच असलेल्या झाडांमुळे माणसांचा जीव जातो म्हणत झाडे तोडण्याचे समर्थन करणाऱ्यांची आंदोलनेही झाली. ती दोन्ही झुगारुन पालिकेने मंगळवारी सुनावणी झाल्यानंतरही वृक्षतोड सुरूच ठेवल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने मंगळवारी (दि. 7) दुपारी 12 वाजता 28 एप्रीलपर्यंत नाशिकमध्ये कोणतीही वृक्षतोड करु नये, असे आदेश दिले. मात्र, ही स्थगिती मिळेपर्यंत गंगापूररोडवरील 44 पैकी 22 वृक्षांचा बळी गेला होता. जेहान सर्कल ते गोवर्धन या पट्ट्यातील रस्ता रुंदीकरणासाठी महानगरपालिकेने वृक्षतोडीचा सपाटा लावला होता. ही बाब कळताच पर्यावरणप्रेमींनी तातडीने घटनास्थळी धाव घेत काम थांबवण्याची विनंती केली. मात्र, ‘ऑर्डरची प्रत दाखवा’ असे म्हणत यंत्रणेने काम सुरूच ठेवले. यामुळे अधिकारी आणि वृक्षप्रेमींमध्ये शाब्दिक चकमक उडाली. अखेर दुपारी 1 वाजता महापालिकेकडून काम थांबविण्यात आले.
कोल्हापूरच्या राजकारणात मोठी घडामोड घडत असून, समरजीत घाटगे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी ‘घरवापसी’ करत पुन्हा भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत पक्षाच्या मुख्यालयात त्यांचा अधिकृत प्रवेश होणार असून, या निर्णयामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. समरजीत घाटगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, ते आपल्या मूळ पक्षात परतत आहेत आणि यामुळे कोणालाही अडचण निर्माण होणार नाही. त्यांनी सांगितले की, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी असलेला दीर्घकालीन वाद आता संपुष्टात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यानच दोन्ही नेत्यांमध्ये सलोखा निर्माण झाला होता. या बदलामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. घाटगे यांनी पुढे सांगितले की, भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय अचानक घेतलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून याबाबत चर्चा सुरू होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपच्या चिन्हावर निवडून येत पक्षाशी जवळीक वाढवली होती. प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच त्यांनी हा निर्णय अंतिम केला. पुन्हा पक्षात येताना समाधान आणि अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही भावना व्यक्त करताना त्यांना मोठ्या भावासारखे संबोधले. पक्ष सोडल्यानंतरही त्यांनी फडणवीसांचा आदर कायम ठेवला होता, असेही त्यांनी सांगितले. आता पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळत असल्याने आनंद होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात महायुतीतील सर्व नेत्यांसोबत समन्वयाने काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयापूर्वीच घाटगे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी सांगितले की, हा निर्णय त्यांनी कोणालाही न सांगता घेतलेला नसून, सर्व संबंधित नेत्यांना माहिती देऊनच पुढे पाऊल टाकले आहे. त्यामुळे या निर्णयाला राजकीय पारदर्शकतेची जोड मिळाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, कोल्हापूरमधील स्थानिक राजकारणात घाटगे आणि मुश्रीफ यांची एकत्रित आघाडी यापूर्वीच प्रभावी ठरली होती. कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत या आघाडीने सर्व 23 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. नगराध्यक्षपदी सविता माने यांची निवड झाली होती. या विजयामुळे दोन्ही नेत्यांच्या एकत्रित ताकदीला मतदारांनी मोठा पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले होते. कोल्हापूरमध्ये महायुती अधिक बळकट होण्याची शक्यता मात्र, दुसरीकडे मुरगुड नगरपालिकेत या आघाडीला धक्का बसला होता. त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवत सत्ता हस्तगत केली. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. आता घाटगे यांच्या भाजपमध्ये पुनरागमनामुळे कोल्हापूरमध्ये महायुती अधिक बळकट होण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांमध्ये त्याचा मोठा परिणाम दिसू शकतो.
अवकाळीचा कहर ओसरला, पण उन्हाचा तडाखा वाढणार:हवामान विभागाचा इशारा; शेतकऱ्यांना दिलासा की नवा संकट?
गेल्या काही आठवड्यांपासून राज्यभर अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे निर्माण झालेल्या संकटानंतर आता वातावरणात बदल होताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये झालेल्या पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला असून शेतकरी अजूनही सावरलेला नाही. मात्र, बुधवारी म्हणजे 8 एप्रिलपासून हवामानात काहीसा बदल जाणवू लागला आहे. पावसाचा जोर ओसरत असला तरी संपूर्ण दिलासा मिळालेला नाही. भारतीय हवामान विभाग ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्यात आज पावसाचा कोणताही मोठा इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि तापमानात हळूहळू वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अवकाळी पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31 ते 35 अंशांच्या दरम्यान राहू शकते. पुढील काही दिवसांत तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह कोकण पट्ट्यात हवामानात स्पष्ट बदल जाणवत आहेत. आर्द्रतेसह उष्णता वाढल्याने वातावरण दमट आणि त्रासदायक होण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी सूर्याचा तडाखा तीव्र जाणवत असल्याने नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेतच आवश्यक कामे उरकावीत, तसेच पाण्याचे प्रमाण वाढवून आरोग्याची काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, देशाच्या इतर भागांमध्ये मात्र वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्ली आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा प्रभाव कायम आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान खात्याने काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. उष्णतेचा धोका वाढत असल्याने सतर्क राहणे आवश्यक हवामान तज्ञांच्या मते, उत्तर भारतात सुरू असलेल्या या घडामोडी हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये हवामान साफ होण्यास सुरुवात झाली असून, पुढील दोन दिवसांत इतर भागातही सुधारणा होईल. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर बिहार, ओडिशा आणि तेलंगणाच्या काही भागांमध्येही हलक्या सरी पडू शकतात. एकंदरित, राज्यात अवकाळी संकट ओसरत असले तरी उष्णतेचा धोका वाढत असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ३० टक्के शेतकरी अनुदानापासून वंचित असून, त्यांना तातडीने अर्थसाहाय्य देण्यात यावे, अशी मागणी आझाद फाउंडेशनने केली आहे. याबाबत कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना फेब्रुवारी २०१९ पासून सुरू केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) दोन हजार रुपये प्रति हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यांत, प्रति वर्षी ६ हजार रुपये त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात लाभ जमा करण्यात येतो. केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनानेही ही योजना सुरू केली. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन शेती खर्चाला हातभार लावण्याचा या योजनेचा उद्देश आहे. ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश आहे. त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरत आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत बाळापूर तालुक्यातील ३० टक्के लाभार्थी वंचित असल्याचे आझाद फाउंडेशनने कृषी अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार राबवत असलेल्या मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थींना अनेक तांत्रिक कारणांमुळे अनुदानाच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे, असे आझाद फाउंडेशनने निवेदनात नमूद केले आहे. तालुक्यातील जवळपास ३० टक्के लोकांना सीएम किसान निधी मिळाला नसल्यामुळे याची तात्काळ योग्य ती दखल घेऊन उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. असे आहेत लाभार्थी : काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ कालावधीतील २२ व्या हप्त्याच्या वितरणाला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील १ लाख ८८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ३८ कोटी रुपये जमा होत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) ही देशातील सीमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी लाभ दिला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्वरीत या पैशांचा वापरही करता येतो. लाभ मिळण्यासाठी ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर जावून लाभार्थींना थेट अर्ज करावा लागतो. अशी आहे राज्याची योजना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते. केंद्र शासनाच्या या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे प्रति वर्षी आणखी सहा हजार रुपये अनुदान देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाते. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतक-यांना प्रति वर्षी बारा हजार रुपये अनुदान मिळत असते. राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थींना आतापर्यंत एकूण सहा हप्ते देण्यात आले आहेत.
कृउबात आठ हजार क्विंटल तुरीची आवक:मंगळवारी सर्वाधिक आवक; शनिवारी मिळाला सर्वाधिक 8270 रुपये दर
जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी तुरीचे पीक काढले असून महिनाभरापासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक होत आहे. मंगळवारी येथील बाजार समितीत २२०० क्विंटल तुरीची आवक झाली. यात शेतकऱ्यांना क्विंटल मागे कमीतकमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त ८०९५ दर मिळाला. तर सरासरी ८०६० रुपयांचा दर मिळाला आहे. गत सहा दिवसात अकोला बाजार समितीत आठ हजार क्विंटल तुरीची आवक झाली आहे. सोमवारी बाजार समितीत १३०९ क्विंटल तुरीची आवक झाली. शेतकऱ्यांच्या तुरीला क्विंटल मागे सरासरी ८२५५ रुपये दर मिळाला. कमीतकमी सात हजार रुपये तर जास्तीत-जास्त आठ हजार रुपयांचा दर मिळाला आहे. अकोला बाजार समितीत शनिवारी शेतकऱ्यांनी सुमारे १६७४ क्विंटल तूर विक्रीसाठी आणली. शेतकऱ्यांना क्विंटल मागे कमीतकमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त ८३५० रुपयांचा दर मिळाला. तर क्विंटल मागे सरासरी ८२७० रुपयांचा दर मिळाला आहे. तर ३ एप्रिल रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी १२४५ क्विंटल तूर विक्रीसाठी आणली. दरात चढ- उतार शुक्रवारी क्विंटल मागे शेतकऱ्यांना ६५०० ते ८४५५ रुपयांचा दर मिळाला तर सरासरी ८२०० रुपयांचा दर मिळाला आहे. तसेच बुधवारी (दि.१) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १५८१ क्विंटल तूर विक्रीसाठी आणली. यावेळी तुरीला कमीतकमी सात हजार रुपये तर जास्तीत-जास्त ८२३५ रुपयांचा दर मिळाला. तर क्विंटल मागे सरासरी ८१५० रुपयांचा दर मिळाला आहे. तालुका क्षेत्र (हेक्टर) अकोट ५१५० तेल्हारा ६१०० बाळापूर ११४०३ पातूर ५६४० अकोला १०९०० बार्शीटाकळी ९३०० मूर्तिजापूर ११२६९ एकूण ५९,७६२ {गेल्या सहा दिवसात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ हजार क्विंटल तुरीची आवक झाली. जिल्ह्यातील तुरीचे एकूण क्षेत्र अधिक पेरणीमुळे आवक सुरू ^बाजार समितीत मंगळवारी २२०० क्विंटल तूर आली. शेतकऱ्यांना क्विंटल मागे सरासरी ८०६० रुपयांचा दर मिळाला आहे. जिल्ह्यात यावर्षी एकूण क्षेत्राच्या सरासरी ९९ टक्के क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले असून अजूनही बाजार समितीत आवक सुरू आहे. - सुनील मालोकार, सचिव, बाजार समिती, अकोला.
ड्रग्सविरोधात ‘दखल’ची एसपी कार्यालयावर धडक:पुरवठा साखळी उघड करा; आरोपींवर कारवाईची मागणी
ड्रग्स पुरवठा साखळी शोधून मुख्य आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यासह अन्य मागण्यांसाठी दखल संस्थेने मंगळवारी पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. पोलिस अधीक्षकांना निवेदनही सादर करण्यात आले. शाळा, कॉलेज परिसर व नागरी वस्त्यांमध्ये गस्त वाढवण्यासाठीही आग्रह धरण्यात आला. सध्या अकोल्यात अंमली व नशेच्या पदार्थांच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. अलीकडील काही दिवसांत वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमे तसेच सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या व्हिडिओंमधून असे निदर्शनास येत आहे की अल्पवयीन मुले रस्त्यावर व नागरी वस्त्यांमध्ये असामाजिक कृत्ये करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. याबाबत अनेक नागरिकांनी आमच्या संस्थेकडे तक्रारी व माहिती दिली आहे, असे ‘दखल’ने निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देताना प्रदीप गुरुखुद्दे, शरद वानखडे, योगेश अग्रवाल, ठाकुरदास चौधरी, राजेश डोंगरकर, जयप्रकाश पाटील, शशिकांत हांडे, काजल राजवैद्य, अनिता कवडे, राजेश शिंदे आदी होते. दखलने काही मागण्या केल्या आहेत. यात अमली व नशेच्या पदार्थांच्या विक्रीवर तात्काळ विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यात यावी. ड्रग्स पुरवठा साखळी शोधून मुख्य आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. शाळा, कॉलेज परिसर व नागरी वस्त्यांमध्ये नियमित गस्त वाढवण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. विक्रेते करतात मुलांना लक्ष्य अमली पदार्थ विक्रेते लहान वयातील मुलांना लक्ष्य करून त्यांना व्यसनाच्या आहारी नेत आहेत. यामुळे केवळ त्या मुलांचे भविष्यच नव्हे तर संपूर्ण युवा पिढी धोक्यात येत आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. सामाजिक सुरक्षिततेसाठी मोठा धोका निर्माण करणारा आहे. अकोला शहर हे शिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे. ग्रामीण भागातून अनेक पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी येथे पाठवितात. अशा परिस्थितीत शहरातील सुरक्षितता व निरोगी वातावरण राखणे ही प्रशासनाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे, असेही निवेदनात नमूद केले.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी पक्षात मोठे बदल करण्याचे संकेत दिल्याने राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेत ‘जे काम करतील तेच टिकतील’ असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाला असून, आगामी काळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात नुकतीच शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यातूनच शिंदेंचा कडक इशारा स्पष्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे स्वतः पक्षातील मंत्री, आमदार, खासदार, संपर्क प्रमुख, विभाग प्रमुख तसेच महिला आघाडी आणि जिल्हा-शहर प्रमुखांच्या कामाचा तपशीलवार आढावा घेणार असल्याची माहिती आहे. प्रत्येक पदाधिकारी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे का, याचे परीक्षण करण्यात येणार आहे. पदावर असूनही काम न करणाऱ्यांना हटवले जाईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर मोठी हालचाल सुरू झाली आहे. शिंदेंनी पक्षवाढीवर भर देत पुढील तीन वर्षे निवडणुका नसल्याने संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील 43 हजार गावांपर्यंत शिवसेना पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संपर्क प्रमुखांना केवळ त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित न राहता इतर जिल्हे आणि लोकसभा मतदारसंघाची जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे. त्यांच्या कामाचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे पक्षात कामकाजावर अधिक लक्ष केंद्रीत केले जात आहे. याचबरोबर ‘फक्त निधीसाठी येणाऱ्यांना दूर ठेवले जाईल’ असा स्पष्ट संदेश देत शिंदेंनी गुणवत्ता महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले आहे. पक्षात केवळ सक्रिय आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांनाच मोठी पदे दिली जातील, असेही त्यांनी सूचित केले आहे. भाजपच्या कामकाजाच्या पद्धतीप्रमाणेच संघटन उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. मतदार याद्यांवर काम, प्रत्येक बीएलएपर्यंत पोहोचणे आणि भविष्यातील मतदारसंघ पुनर्रचनेसाठी तयारी ठेवणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. काही मंत्र्यांबाबत शिंदे नाराज दरम्यान, अलीकडील जिल्हा परिषद निवडणुकांतील कामगिरी पाहता काही मंत्र्यांबाबत शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. विशेषतः दोन मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही, अशी नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही अपेक्षित कामगिरी झाली नसल्याने शिंदेंनी यापूर्वीच फेरबदलाचे संकेत दिले होते. मात्र, त्यावेळी परिस्थिती पाहता निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता मात्र पक्षात मोठ्या बदलांची शक्यता अधिक बळावली असून, ‘भाकरी फिरवण्याची’ तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे चित्र दिसत आहे.
मेळघाटमध्ये जलजीवन फसले; आंदोलनानंतर यंत्रणेला साकडे:ठिकठिकाणी आंदोलनानंतर चौकशीची केली मागणी
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत आदिवासीबहुल मेळघाटमध्ये अनेक विकास कामे केल्याचा दावा केला जातो. मात्र यातील काही कामे कागदावरच असून इतर कामांचा दर्जा अगदीच निकृष्ट आहे. त्यामुळे युवक काँग्रेसने हे जलजीवन मिशन मेळघाटात फसल्याचा आरोप केला असून त्यासाठी यंत्रणेला साकडे घातले आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सांगून त्याची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी केली जावी, अशी युवक काँग्रेसची मागणी आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांच्यामते ‘हर घर-नल से जल’ या पंतप्रधानांच्या नावे सुरु करण्यात आलेली योजना याठिकाणी सपशेल अयशस्वी ठरली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत खटकाली, मेनघाट व गरजधारी येथे पाणी वितरणासाठी एक ते दीड मीटर जलवाहिनी दाखवून त्यावर लाखो रुपये खर्च दर्शविण्यात आला. परंतु वास्तविक पाहता ती पाइपलाइन जमीनीवरच आहे. खोदकाम करुन ती जमीनीच्या आत दाबलीच गेली नाही. याऊलट प्रत्येक गावातील पाणी वितरण व्यवस्थेचे खोदकाम जास्त दाखवून मोठाली बिले मात्र काढली गेली. त्याचप्रमाणे मेळघाटमधील जलजीवन मिशन मध्ये जुन्याच जलकुंभांना रंगरंगोटी करुन मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची रक्कम हडप केली गेली. चिखलदरा तालुक्यातील चिलाटी येथील ग्रामीण पुरवठा योजनेंतर्गतची जुनी टाकी २०१२-१३ मध्ये बांधली गेली. ती टाकी पूर्णपणे हालते. एवढेच नव्हे तर तिला गळतीही लागली आहे. त्या टाक़ीची रंगरंगोटी करुन २०२२-२३ मध्ये लाखो रुपये खर्च करण्यात आले. पण पाणी पुरवठा अजूनही बंदच आहे. सुमिता येथेही असाच प्रकार करण्यात आला असून तेथील खर्चाची उचलही करण्यात आली आहे. सध्यस्थितित तेथील आदिवासी बांधवांना डोक्यावर घागर ठेऊनच पाणी आणावे लागत आहे. रुईपठारला नवीन टाकी बांधली. त्यात डोमीवरून पाईपलाईन टाकून पाणी आणले. परंतु नवीन टाकीत एकही थेंब पाणी नाही. लोकं आजही जुन्याच टाकीचे पाणी वापरतात. डोक्यावर पाणी आणावे लागते. मग नवीन टाकी बांधून उपयोग काय, असा ग्रामस्थांचा प्रश्न आहे. कुहीला दोन टाकी आहेत, तरी पाणी पुरवठा होत नाही. लोकांना विहिरीवरून डोक्यावर पाणी आणावे लागते. सिमोरी येथे टाकी बनविली, तेव्हापासून आजपर्यंत टाकीत पाणीच गेले नाही. ३ किलोमिटर अंतर चुर्णीच्या रहिवाशांसाठी तीन किलोमीटर अंतरावरुन पाइपलाईन घेतली आहे. आहाड, मेनघाट, ग़रज़धारी आदी गावे जलजीवन मिशन मध्ये असून तेथील जुने जलकुंभ पडण्याच्या मार्गावर आहेत. भुलोरी, बारूगव्हान, चोबिता, हिलड़ा, बोरधा, कोहाना, हतरु, दहेंद्री येथेसुद्धा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे या सर्व कामांची चौकशी करणे गरजेचे झाले आहे. सीईओ सरपंचांशी विषयांवर बोलणार जलजीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याच्या युवक काँग्रेसच्या तक्रारीनुसार सीईओंनी प्रत्येक गावच्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्याशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी मेळघाटच्या दोन्ही तालुक्यातील बीडीओंना पत्र देण्यात आले असून ही ऑनलाईन बैठक लवकरच घेतली जाणार असल्याचे सीईओंनी स्पष्ट केले.
पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास आणि संस्कृती शिकण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, जेवड येथील विद्यार्थ्यांनी नुकतीच गुजरात राज्याची शैक्षणिक सहल केली. जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या ''स्टॅच्यू ऑफ युनिटी''ला भेट देत विद्यार्थ्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या उत्तुंग कार्याचा आढावा घेतला. तसेच साबरमती आश्रमात महात्मा गांधींच्या सत्य-अहिंसेचे धडे गिरवले.या शैक्षणिक सहलीमध्ये ८ वी ते १० वी मधील विद्यार्थी सहभागी झाले होते. शैक्षणिक आणि ऐतिहासिक वारसा जवळून पाहता यावा, या उद्देशाने या सहलीचे नियोजन करण्यात आले होते.केवळ पर्यटन म्हणून नव्हे, तर इतिहास, संस्कृती आणि देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी ही सहल मैलाचा दगड ठरली. याशिवाय अहमदाबाद शहरातील इतर शैक्षणिक व ऐतिहासिक स्थळांनाही भेटी देण्यात आल्या. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची मोठी सहल आयोजित केल्यामुळे पालक आणि शैक्षणिक वर्तुळातून शाळेचे कौतुक होत आहे. महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने अभ्यासक सहलीचे आयोजन केल्याबद्दल आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी कौतुक केले. आयोजन गटनेता डॉ. राजेंद्र तायडे, उपसभापती सुमती ढोके, नगरसेविका शारदा खोंडे, नगरसेवक संजय गव्हाळे यांचे योगदानातून तसेच उपायुक्त नरेंद्र वानखडे, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांचे मार्गदर्शनात पार पडली. मुख्याध्यापक प्रशांत नालसे व शिक्षक शीला डांगे, सीमा शिरभाते, किरण नालिंदे, वैशाली बुटे, हर्षा दिवे, पुष्पा कोरडे, सोनाली चापके, किरण शेंडे, शिरीष फसाटे व पालक यांच्या सहकार्याने करण्यात आले. साबरमतीत गांधीजींच्या विचारांचा वारसा सहलीच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी अहमदाबाद येथील ऐतिहासिक साबरमती आश्रमाला भेट दिली. महात्मा गांधींचे साधे जीवन आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान पाहून विद्यार्थी भारावून गेले. चरख्यावर सूत कताईपासून ते मिठाच्या सत्याग्रहापर्यंतच्या घटनांची माहिती देणारी चित्रे आणि वास्तू विद्यार्थ्यांनी आस्थेने पाहिल्या.
विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात मेरिटमध्ये येण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत, योग्य नियोजन आणि पालकांचा ठाम पाठिंबा अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सेंच्युरी गाठण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे,” असे प्रा. संदीप मुर्तडकर यांनी सांगितले. पुढील वर्षीच्या निकालात आदर्श विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी विविध क्षेत्रांत मेरिटमध्ये येतील. यासाठी कार्यशाळांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उद्यापासूनच विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही प्रमुख वक्ते प्रा. मुर्तडकर यांनी दिली. शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासातील सातत्य, आत्मविश्वास व स्पर्धात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ‘मेरिट मेकर प्रोजेक्ट’ अंतर्गत २०२६-२७ साठी आयोजित करण्यात आलेली ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांची विशेष पालक सभा ६ एप्रिल रोजी कृषी भवन येथे उत्साहात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व शाळा समिती सदस्य प्राचार्य केशवराव गावंडे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे, शाळा तपासणी अधिकारी व्ही. डब्ल्यू. गावंडे, मेरिट मेकरचे संचालक प्रा. संदीप मुर्तडकर, शाळेचे मुख्याध्यापक एम. आर. देशमुख, उपमुख्याध्यापक एस. बी. ठाकरे, शिक्षक प्रतिनिधी अनिल भारसाकळे, माध्यमिक प्रभारी पी. एम. काळे, जुनिअर कॉलेजचे प्रा. पि. डी. गावंडे, आदर्श स्वयंअर्थसहाय्यित शाळेचे मुख्याध्यापक धनंजय गावंडे, शिक्षकेत्तर प्रतिनिधी प्रदीप भारसाकळे, ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख, पालक शिक्षक समितीचे सदस्य मंगला पातूर्डे, सुरेश सपकाळ यांची मंचावर उपस्थिती होती. प्रमुख अतिथी सुनील गावंडे यांनी आपल्या भाषणात शेतकरी व त्यांच्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण वैयक्तिक पातळीवर तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सदैव तत्पर राहू, असे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून अभ्यासात मेहनत घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मनोज देशमुख यांनी केले. संचालन व उपस्थित मान्यवरांचा परिचय शिक्षक गजानन घटाळे यांनी करून दिला. आभार प्रदर्शन शिक्षक प्रतिनिधी अनिल भारसाकळे यांनी केले. लाईव्ह प्रक्षेपणाचे काम नरेश इसळ यांनी पाहिले. एनएमएमएस परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन अध्यक्षीय भाषणात प्राचार्य केशवराव गावंडे यांनी आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी अभिनंदन केले. या यशामध्ये मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षिकावृंद यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील काळातही अशाच प्रकारे तज्ज्ञ मार्गदर्शकांना आमंत्रित करून अधिकाधिक कार्यशाळांचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
14 पुरस्कारांचा मानकरी, पण फीसाठी संघर्ष:शैक्षणिक खर्चासाठी विवंचनेत अडकला विहिगावचा सोहम नेसनेसरकर
तालुक्यातील विहिगाव येथील सोहम मोहन नेसनेसकर या अवघ्या सात वर्षांच्या चिमुकल्याने आपल्या जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकवला आहे. व्हिएतनाम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक प्राप्त केले. मात्र सोहम, त्याचे कुटुंबीय, आता शैक्षणिक खर्चाच्या विवंचनेत अडकले आहेत. सोहमने आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत जपान, मलेशिया, यजमान व्हिएतनामसारख्या बलाढ्य देशांतील स्पर्धकांना मागे टाकत सुवर्णपदकावर दावा ठोकला होता. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला ‘भारत भूषण’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, सुवर्णपदक असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सध्या सोहम हा येथील ओम इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिकत आहे. भविष्यात सोहमला दर्जेदार शिक्षण, प्रशिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. कुटुंबाचे उत्पन्न अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे त्याच्या पालकांनी मदतीचे आवाहन केले आहे. योग्यवेळी सहकार्य मिळाल्यास हा चिमुकला भविष्यात देशाचे नाव आणखी उंचावेल, अशी आशा अनेकांकडून व्यक्त होत आहे. मात्र ती खरी ठरवण्यासाठी सर्वांनी मदत करावी, असे त्याच्या पालकांचे म्हणणे आहे. सोहम वयाच्या चौथ्या वर्षापासून योगाभ्यास करत आहे. सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्याने फेब्रुवारी २०२५ मध्ये राष्ट्रीय योगा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. याच यशाच्या बळावर त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. सोहमच्या या जागतिक यशाची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली उर्वरित. पान ४ आतापर्यंत १४ राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्याचा सन्मान महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. ‘अँटी हिरमण फाउंडेशन’ आणि केंद्र सरकारच्या ‘नीती आयोगा’मार्फतही त्याच्या कामगिरीची दखल घेण्यात आली आहे. आतापर्यंत सोहमला ‘महाराष्ट्र गौरव’, ‘राष्ट्र गौरव’, ‘क्रीडा शिरोमणी’सह एकूण १४ राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
एक्सक्लुझिव्ह:विमानतळावर डीव्हीओआर यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण, अथाॅरिटीकडून परवान्याची प्रतीक्षा
रात्री विमान उतरवताना धावपट्टीचा अचूक अंदाज यावा, विमानापासूनचे अंतर, उंची, दिशा कळावी यासाठी मार्गदर्शक प्रणाली डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी रेंज (डीव्हीओआर) बेलोरा विमानतळावर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे आता रात्री बेलोरा विमानतळावरून विमानोड्डाण तसेच विमान उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी डीजीसीए व भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून मिळणारी परवानगी व परवान्याची प्रतीक्षा आहे. डीव्हीओआर यंत्रणेमुळे रात्री वैमानिकाला विमानाचे लॅण्डींग, टेकऑफ करण्यासाठी संपूर्ण सहकार्य, मार्गदर्शन मिळत असते. जोवर ही यंत्रणा कोणत्याही विमानतळावर उभारली जात नाही. तोवर त्या विमानतळावरून रात्री विमानोड्डाण व विमान उतरवणे शक्य नसते. अमरावती हे विभागाचे मुख्यालय असल्यामुळे येथे दररोज कोणत्या ना कोणत्या नेत्याचे, मंत्र्यांचे आगमन होत असते. जिल्ह्यासह शहरातील उद्योजक, नेते, आमदारांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. त्यांनाही वेळ, पैसा, इंधन खर्च करून नागपूरला जावे लागते. अमरावतीला बहुतेक नेते हे खासगी कंपनीच्या विमानाने येतात. सायंकाळ झाली की, या विमानांना विमानतळावरच उभे राहावे लागत होते. कारण, विमानोड्डाण शक्य नव्हते. परिणामी अनेकदा नेत्यांना अमरावतीत मुक्काम करावा लागला आहे. दिशादर्शक लाईट्स बसवण्याचे काम यंत्रणेकडून झाले पूर्ण विमान उतरताना धावपट्टी उंचीवरून व लांबून दिसावी यासाठी बेलोरा विमानतळाच्या धावपट्टीवर दिशादर्शक लाईट्स बसवण्यात आले आहेत. लाल, हिरवे, पांढरे असे हे लाईट्स असून त्यांच्या प्रखरतेमुळे ते उंचीवरून तसेच लांबूनही सहज दिसतात. विमानातील रडार व डीव्हीओआर यंत्रणा विमानाला या धावपट्टीचे अंतर, दिशा, उंची याबाबत सतत माहिती देत असते. त्यामुळे हे लाईट्स बसवणे आवश्यक असते. ते धावपट्टीचा नेमका आकार, लांबी कळण्यासाठी सहायक ठरतात.
इथून पुढे ३ वर्षे कोणत्याही निवडणुका नाहीत, त्यामुळे उमेदवारीसाठी नाही, मला कोणतेही पद नको त्यामुळे पद मिळावे म्हणूनही नाही, तर पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील विकास कामे व्हावीत, कार्यकर्त्यांची स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होणारी अडवणूक थांबावी यासाठी आपली सर्वांची संमती असेल तर सत्तेसोबत जावे लागेल, अशी साद श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी कार्यकर्त्यांना घातली. यावर कार्यकर्त्यांनी हात उंचावून एकमताने भालके घेतील त्या निर्णयास संमती असल्याचे सांगितले. यानुसार येत्या दि. १२ एप्रिल रोजी भगीरथ भालके यांचा आपल्या समर्थकांसह शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत यांनीही शिवसेना प्रवेशाचे सूतोवाच केल्याने या दोन्ही नेत्यांचा सेना प्रवेश निश्चित झाला आहे. भगीरथ भालके गटाने काँग्रेस पक्षाला हात दाखवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी भालके यांनी पंढरपूर येथे कार्यकर्त्याची बैठक बोलावली होती. यावेळी भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, शिवसेना नेते साईनाथ अभंगराव यांच्यासह मोठ्या संख्येने विविध गावचे सरपंच, आजी, माजी पदाधिकारी, शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या २ वर्षात स्थानिक लोक प्रतिनिधींनी आपल्या ग्रामपंचायतींचा निधी अडवला आहे, त्या गावातील विकास कामे ठप्प केली आहेत, पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो. नगराध्यक्षपदासोबत ११ नगरसेवक दिले ^४ महिन्यापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पंढरपूरच्या नागरिकांनी आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवर विश्वास टाकून नगराध्यक्षपदासोबत ११ नगरसेवक निवडून दिले. मात्र विकास कामे करण्यासाठी, निधी उपलब्ध करून घेण्यासाठी सत्तेसोबत जाण्याची गरज निर्माण झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत येण्याचे आवाहन केले आहे, तसेच लागेल तर मदत करणे, सर्व ताकद पाठीशी उभा करू असा शब्द देतानाच त्यांच्याकडील नगरविकास खात्यामधून विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिलेले आहे. भगीरथ भालके, माजी अध्यक्ष
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीवर मोठा परिणाम झाला. वेळेवर वापसा न मिळाल्याने ज्वारीची पेरणी उशिरा झाली आणि त्यामुळे एकूण लागवड क्षेत्रही घटले. परिणामी, ज्वारीपासून मिळणाऱ्या कडब्याचे उत्पादन कमी झाले असून याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. सध्या कडब्याच्या दरांनी उच्चांक गाठला असून प्रति शेकडा सुमारे ३००० ते ४५०० रुपयांपर्यंत भाव पोहोचले आहेत. परगाव व इतर जिल्ह्यांतूनही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने दर अधिकच वाढले आहेत. त्यामुळे पशुपालक आणि शेतकऱ्यांना कडबा खरेदी करणे कठीण होत आहे. या परिस्थितीत शेतकरी कडब्याला पर्याय म्हणून मका पिकाचा वापर करत आहेत. हिरवा चारा म्हणून मक्याची लागवड करून, आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने त्याची कुट्टी करून मुरघास (सिलेज) तयार केला जात आहे. सध्या मका २७०० ते २८०० रुपये प्रति टन या दराने उपलब्ध असून, त्यापासून तयार होणारा मुरघास हा स्वस्त आणि पोषक पर्याय ठरत आहे. पशुपालकांच्या मते, मका मुरघासामुळे जनावरांच्या दूध उत्पादनातही वाढ होत आहे. त्यामुळे येत्या काळात कडब्याऐवजी हिरव्या चाऱ्यासाठी मक्याचा वापर वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हिरवा चारा बाजारात आहे, मात्र त्याची किंमत गगनास भिडलेली आहे. सध्या हिरव्या चाऱ्याचे दर खूप वाढलेले आहेत. हिरव्या चाऱ्याची पेंड ३० ते ३५ रुपये झाली आहे. दूध देणाऱ्या जनावरांसाठी दिवसाला आठ ते दहा पेंड्याचा बंदोबस्त करून ठेवावा लागतो. त्यामुळे दिवसाला जवळपास साडेतीनशे रुपये या जनावरांसाठी खर्च करावा लागत आहे. तसेच या जनावरांकडून मिळणारे दुध आणि होणारा खर्च याचा मेळ देखील बसत नाही आहे. यामुळे दुधाचा व्यवसाय करणारे पशू पालक अत्यंत अडचणीत आला आहे. ^ शेतकरी संपत कुंभार (पांडे) यांनी सांगितले की कडब्याचे दर परवडत नसल्यामुळे आम्ही मका मुरघासाचा पर्याय स्वीकारला असून तो अधिक फायदेशीर ठरत आहे. संपत कुंभार, शेतकरी, पांडे ज्वारीच्या पेरणीमध्ये ६७६३ हेक्टर पेरा कमी ^सन २०२५- २६ या वर्षी प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी कारणाने ज्वारीच्या पेरणीमध्ये सुमारे ६७६३ हेक्टर पेरा कमी झाला आहे. गुरांना चाऱ्यासाठी ज्वारीच्या पिकांपासून मिळणारा कडबा अत्यंत महागलेला आहे. त्यामुळे शेतकरी मक्याच्या मुरघासाकडे वळाला आहे. दत्तात्रय गायकवाड, उप.तालुका कृषी अधिकारी, करमाळा कडब्याचे दर परवडत नाही

28 C