काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरून खासदार पार्थ पवार यांच्यावर कृतघ्न मुलगा म्हणत जहरी टीका केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसवर जोरदार पलटवार करत काँग्रेसला दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आपले नेते राहुल गांधींच्या कामगिरीकडे पाहण्याचा टोला हाणला आहे. काँग्रेसने आमच्या नेत्यावर टीका करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय केले ते अगोदर पाहावे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. पार्थ पवार यांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसवर निशाणा साधताना राज्यात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर सडकून टीका केली होती. विशेषतः शरद पवारांनीही त्यांच्या राजकीय परिपक्वतेवर निशाणा साधला होता. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही पार्थ पवारांना काँग्रेसचे मोठेपण लक्षात आणून देत आपण स्वतः व पार्थ यांचे वडील अजित पवारही काँग्रेसच्या मुशीत तयार झाल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी पार्थ पवारांवर होणारी टीका फेटाळताना राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने राजकीय परंपरेला छेद दिला सूरज चव्हाण म्हणाले, काँग्रेसने आमच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय केले ते अगोदर पाहावे. एखाद्या नेत्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्ती पोटनिवडणूक लढवत असेल तर ती निवडणूक बिनविरोध करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण काँग्रेसने ती परंपरा पाळली नाही. काँग्रेसने राजकीय परंपरेला छेद देण्याचे काम केले. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही महाराष्ट्राची जनभावना आहे. पण या जनभावनेपासून दूर गेलेली काँग्रेस ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. काँग्रेसच्या या भूमिकेचा दाखला देत पार्थ पवारांनी काँग्रेसचे डाऊनफॉल सुरू होईल असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. काँग्रेसने आमच्या नेत्यांवर पुन्हा अशी टीका केली तर त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. आत्ता पाहू काँग्रेसने काय केली होती पार्थ पवारांवर टीका? महाराष्ट्र काँग्रेसने पार्थ पवारांवर टीका करताना त्यांचा उल्लेख कृतघ्न मुलगा असा केला होता. काँग्रेसने म्हटले होते, धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रगेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे, असे काँग्रेसने म्हटले आहे. शेवटी पाहू काय म्हणाले होते पार्थ पवार? तत्पूर्वी, पार्थ पवार काँग्रेसवर निशाणा साधताना म्हणाले होते, माझे कुणाशीही बोलणे झाले नाही. पण काँग्रेसला कळायला पाहिजे काय करायचे ते. त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला माहिती नाही. सगळे मोठे लोक आहेत. सर्वांना माहिती आहे काय सुरू आहे. त्यांनी विचार केला असेल, तर करू द्या. पण त्यांना नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात, हे त्यांना दिसेल. लोक विसरत नाहीत. जे दादांचे प्रेम आहे लोकांच्या मनात, अशा वेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचं आहे. मला वाटते की, आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरं जाऊ, आम्ही काही कुणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिलं आहे, ते बघू काय व्हायचंय ते. फक्त मला वाईट वाटतंय की काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे, असे पार्थ पवार म्हणाले होते.
‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ म्हणत खरातने केले अनेक महिलांचं लैंगिक शोषण
नाशिक : प्रतिनिधी एसआयटीकडून सुरू असलेल्या चौकशीदरम्यान ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ म्हणत आपला सहा शब्दांचा खास मंत्रच विशेष तपास समितीला सांगित अशोक खरात याने त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चमत्कार दाखवून किंवा वशीकरण करून नव्हे तर हातचलाखी करून आपण महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे अशोक खरातने कबूल केले […] The post ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ म्हणत खरातने केले अनेक महिलांचं लैंगिक शोषण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने शहराच्या आरोग्याबाबत समोर आलेली आकडेवारी धक्कादायक असली तरी ती प्रत्येकासाठी वेळीच सावध करणारी आहे. बदललेली जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे शहरामध्ये हृदयविकाराचा विळखा घट्ट होत आहे. शहरात महिन्याकाठी तब्बल २ हजार, तर वर्षाकाठी २५ हजारांहून अधिक अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे, पूर्वी उतारवयात दिसणारे हे आजार आता वयाच्या तिशीपासूनच तरुणांना ग्रासत आहेत. काय सांगते छत्रपती संभाजीनगरची आकडेवारी? स्थूलताशहरातील सुमारे 30 टक्के लोक वाढलेल्या पोटाच्या घेरामुळे म्हणजेच ‘ओबेसिटी’चे शिकार आहेत. उच्च रक्तदाब35 टक्क्यांहून अधिक लोक हायपरटेन्शनने ग्रस्त आहेत. तिशीतील तरुणांमध्ये याचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. प्री-डायबेटिकमधुमेह होऊ नये यासाठी काळजी घेतल्यास ते सावरू शकतात. मधुमेह15 टक्क्यांहून अधिक नागरिकांना मधुमेहाने ग्रासले आहे. कर्करोग रुग्णालयात 42 हजार रुग्ण शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ओपीडीमध्ये 2025 या एकाच वर्षात 42,937 रुग्णांनी उपचार घेतले. विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत 13,068 ने मोठी वाढ झाली आहे. ऑन्कोसर्जन डॉ. राजेश सावजी यांच्या मते, महिलांमध्ये स्तनाचा व गर्भाशयाचा, तर पुरुषांमध्ये फुप्फुस व अन्ननलिकेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. आरोग्याची पंचसूत्री नियमित हालचाल: दररोज किमान 45 मिनिटे वेगाने चालण्याचा व्यायाम करा. आहारावर नियंत्रण: मैद्याचे पदार्थ, अति तेलकट आणि साखरेचा वापर कटाक्षाने टाळा. व्यसनमुक्ती: धूम्रपान, मद्यपान आणि गुटख्यापासून पूर्णपणे लांब राहा. वेळोवेळी तपासणी: तिशीनंतर नियमितपणे बीपी आणि शुगरची तपासणी करा. सकस भोजन: आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि कडधान्यांचा समावेश करा. घाबरू नका, जीवनशैली बदला फास्ट फूड सेवनामुळे शरीरात कार्बोदकांचे प्रमाण वाढून स्थूलता येते, ज्यातून मधुमेह, बीपी आणि किडनीचे आजार बळावतात. नियमित 45 मिनिटे चालणे आणि सकस आहार घेतल्यास या गंभीर आजारांना आपण दूर ठेवू शकतो. -डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, (घाटी) शहरात वर्षाला 25 हजार हृदयशस्त्रक्रिया चाळीशी ओलांडलेल्या 30 ते 35 टक्के लोकांना बीपीचा त्रास होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, उच्च रक्तदाब सुरू होण्याचे प्रमाण आता वयाच्या तिशीमध्येही दिसून येत आहे. व्यायामाकडे नागरिकांचे होत असलेले दुर्लक्ष याला प्रामुख्याने कारणीभूत आहे. परिणामी, हृदयविकाराचा धोका वाढला असून छत्रपती संभाजीनगरात महिन्याकाठी तब्बल दोन हजार, तर वर्षाकाठी २५ हजारांपेक्षा अधिक अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी होत आहेत.- डॉ. विलास मगरकर, हृदयरोगतज्ज्ञ महिलांमध्ये स्तनाचा, पुरुषांत फुप्फुसाचा कॅन्सर पूर्वी कॅन्सरचे प्रमाण तुलनेने कमी होते. मात्र, गेल्या दहा वर्षांत रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे पाहायला मिळते. शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात 2025 या एकाच वर्षात तब्बल 42 हजार 937 रुग्णांनी उपचार घेतले. विशेष म्हणजे, त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत तब्बल 13 हजार 68 ने वाढ झाली आहे. कॅन्सरचे प्रमाण साधारण दहा टक्क्यांनी वाढत आहे. महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, तर पुरुषांमध्ये फुप्फुस, आतडे आणि अन्ननलिकेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. यालाही बदलती जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव कारणीभूत असून, धूम्रपान, गुटखा आणि मद्यपान कटाक्षाने टाळावे.- डॉ. राजेश सावजी, ऑन्कोसर्जन आठवड्याला किमान 150 मिनिटे व्यायाम मधुमेहाचा परिणाम केवळ रक्तातील साखरेपुरता मर्यादित नसून हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि मज्जासंस्था यांवर गंभीर परिणाम करतो. यामुळे हृदयरोग, किडनी फेल्युअर, अंधत्व आणि पाय कापण्याची वेळ येण्याचा धोका वाढतो. तसेच आरोग्यखर्चही मोठ्या प्रमाणात वाढतो. उपाय म्हणून संतुलित आहार, नियमित व्यायाम (आठवड्याला किमान 150 मिनिटे), वजन नियंत्रण आणि तणाव व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. नियमित ब्लडशुगर तपासणी, HbA1c मॉनिटरिंग आणि जोखमीच्या व्यक्तींचे लवकर स्क्रीनिंग करणे गरजेचे आहे. समाजपातळीवर जनजागृती, प्रतिबंधक आरोग्य कार्यक्रम आणि प्राथमिक स्तरावर डायबेटीस व्यवस्थापन मजबूत करणे हा दीर्घकालीन उपाय आहे. - अजय रोटे, मधुमेह तज्ज्ञ वैद्यकीय अभ्यासक
राज्यातील दोन उच्चपदस्थ पोलिस अधिकारी भोंदू अशोक खरातच्या संपर्कात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. या अधिकारी डीसीपी व एसीपी दर्जाच्या आहेत. त्या आवडत्या पोस्टिंगसाठी भोंदू अशोक खरातच्या संपर्कात आल्या होत्या. आता त्यांच्यामागे एसआयटी चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणात राजकीय नेत्यांसह उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्यांची नावे आल्यामुळे या प्रकरणाची देशभरात चर्चा होत आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या राज्यात संतापाची लाट उसळली आहे. खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आतापर्यंत त्याच्यावर 13 गुन्हे दाखल झालेत. यातील 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे, 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे, तर एक गुन्हा ईडीने दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा आहे. त्यातच आता त्याला नाशिकमध्ये कार्यरत असणाऱ्या 2 महिला पोलिस अधिकाऱ्यांनी मोठी मदत केल्याची बाब समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन महिला पोलिस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात होत्या. यापैकी एक महिला अधिकारी डीसीपी, तर दुसरी एसीपी दर्जाची होती. या दोघी आपल्याला पसंतीची पोस्टिंग मिळावी यासाठी अशोक खरातच्या संपर्कात आल्या होत्या. आता त्यांनी भोंदू खरातशी काही आर्थिक व्यवहार केले होते का? याचा धुंडाळा विशेष पोलिस तपास घेत आहे. नियमबाह्य मदत केल्याचा आरोप नाशिकमध्ये एकेकाळी बड्या पदावर कार्यरत असलेल्या या महिला अधिकाऱ्याने अशोक खरात याला नियमबाह्य मदत केल्याचा व दोघांमध्ये पैशांचा व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे ही महिला अधिकारी आता पोलिसांच्या रडारवर आली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सदर महिला अधिकाऱ्याने नाशिकमध्ये कार्यरत असताना अनेक प्रशासकीय कामांत अशोक खरातला नियमबाह्य मदत केली होती. या मदतीच्या बदल्यात खरातने आपले राजकीय लागेबांधे व नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला हवी असलेली पोस्टिंग मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे केवळ बदलीपुरते मर्यादित नाही, तर या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झाल्याचेही तपासात समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे भोंदू खरातच्या काळ्या साम्राज्याला या अधिकाऱ्याचे संरक्षण लाभले होते का? या दिशेने SIT आता तपास करत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याची लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हा संशयाचा वेढा अधिक घट्ट झाला असून, लवकरच या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची चिन्हे आहेत. भोंदू खरातने दिली लैंगिक शोषणाची कबुली दुसरीकडे, अशोक खरातने महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली आहे. त्याने महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिकला विज्ञानाचे नाव दिले आहे. त्याच्या मते, त्याने चमत्कार व वशीकरण नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकावून त्यांचे शोषण केले. ज्या गोष्टींना लोक चमत्कार व वशीकरण समजतात, मुळात ती हातचलाखी आहे. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असे तो या प्रकरणी म्हणाल्याचे माहिती आहे. आज अशोक खरातच्या मुलांची चौकशी या प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथक आज अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन व मुलीची चौकशी करणार आहे. खरातचा मुलगा दोन दिवसांपूर्वी संपर्काबाहेर असल्याची बाब समोर आली होती. पण आता तो पोलिसांच्या संपर्कात आला आहे. त्यामुळे त्याला आज पुन्हा त्याची त्याच्या बहिणीसह चौकशी होणार आहे. या दोघांची आई कल्पना ही मात्र अजून फरार आहे.
गुन्हेगारी, विकृती, निर्दयीपणा, क्रूरता, अमानुषपणा या सगळ्यांचाच मनुष्याने कळस गाठला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातील एका घटनेने अक्षरशः माणुसकीला काळिमा फासलाय. एका महिलेने दूसरा चांगला नवरा करण्यासाठी पोटच्या 11 महिन्यांच्या बाळाचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून एखादी आई इतकी निष्ठुर कशी काय असू शकते असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे. मृत बाळाचे वडील रवींद्र अशोक पवार यांनी रांजणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी पूजा रवींद्र पवारला अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एका आईनेच आपल्या 11 महिन्यांच्या पोटच्या गोळ्याचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला पूजा पवार ही कोकण-मुरुड पर्यटनावरून आली होती. मुलगा यश सतत रडत आणि किरकिर करत असल्याच्या कारणावरून तिने घर सोडून जाण्याचा आणि दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लहान मुलगा सोबत असल्यास कोणीही आपल्याशी लग्न करणार नाही, हा विचार तिच्या मनात आला आणि त्यातूनच आपल्या भविष्यातील सुखासाठी अडथळा ठरणाऱ्या निष्पाप मुलाला कायमचे संपवण्याचा क्रूर कट तिने रचला. चिमुरड्याचे डोके सिमेंटच्या ओट्यावर आपटून घेतला जीव माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेत, आरोपी माता पूजा हिने आपल्या अवघ्या 11 महिन्यांच्या यशची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची कबुली दिली आहे. तिने चिमुरड्याचे डोके सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याचा जीव घेतला आणि त्यानंतर हा भयानक गुन्हा लपवण्यासाठी मुलाचा मृतदेह एका बॅगेत भरून शेतातील विहिरीत फेकून दिला. स्वतःच्या सुखासाठी पोटच्या गोळ्याचा असा निर्दयीपणे बळी घेतल्याची माहिती समोर आल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. जन्मदात्या आईकडूनच घडलेल्या या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत असून, निष्पाप बालकाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मृत मुलाचे वडील रवींद्र अशोक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव पोलिसांनी आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.
भारतीय राजकारणात आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत काँग्रेस पक्षाचे योगदान अत्यंत मोठे आहे. देशाच्या पंतप्रधानापासून ते ग्रामपंचायतीच्या सरपंचापर्यंत, तसेच महिला आरक्षणापासून ते देशाने जिंकलेल्या युद्धांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर काँग्रेसची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. हे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसची पाठराखण केली. तसेच, लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असला तरी मर्यादांचे भान हवे, असे म्हणत त्यांनी पार्थ पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, भारतातील संविधानाच्या चौकटीत राहून कोणताही पक्ष काम करत असेल, तर आपण लोकशाही मानणारी माणसे म्हणून त्याचा आदर केला पाहिजे. आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्षाला अत्यंत जवळून पाहिले आहे. मी स्वतः अनेकदा काँग्रेसच्या साथीने निवडणूक लढवून निवडून आले आहे. मी आणि दादा (अजित पवार) दोघेही काँग्रेसच्याच तालमीत लहानाचे मोठे झालो आहोत. आज आपण जो मोकळा श्वास घेतोय आणि आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, ती काँग्रेसची देण आहे हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.पार्थ पवारांच्या संदर्भात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना सुळे म्हणाल्या की, कौटुंबिक सल्ले हे घराच्या चार भिंतींच्या आत दिले जातात, ते माध्यमांसमोर जाहीरपणे सांगायचे नसतात. मात्र, जेव्हा घरातील मोठी व्यक्ती काही बोलते, तेव्हा त्यावर प्रतिवाद न करणे किंवा उलट न बोलणे हे आमचे संस्कार आहेत. या विधानातून त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेचे पूर्णपणे समर्थन केले आहे. मविआचे मानले आभार शरद पवार यांची राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीसह महायुतीतील नेत्यांचेही आभार मानले. त्या म्हणाल्या, विरोधक हा आपला शत्रू नसून ती केवळ एक वैचारिक लढाई आहे, व्यक्तिगत नाही, हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्राने जपला आहे. मतभेद असले तरी मनभेद नसावेत, हीच आपली संस्कृती आहे. याच सामंजस्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध पार पडली. काँग्रेसने घेतलेली भूमिका लोकशाहीला धरूनच राज्यातील पोटनिवडणुकांच्या मुद्द्यावर बोलताना सुळे यांनी स्पष्ट केले की, अनेकदा पोटनिवडणुका बिनविरोध होतात, तर कधी त्या लढवल्या जातात. काँग्रेसने यासंदर्भात घेतलेली भूमिका लोकशाहीला धरूनच आहे, त्यात काहीही गैर वाटत नाही. काँग्रेसशी कोणी संपर्क केला की नाही, याबद्दल मला कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
भाजप-महायुती सरकारने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे नामकरण केले आहे. त्यात प्रामुख्याने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती, ही मागणी महायुतीने पूर्ण केली. त्यानंतर उस्मानाबादचे धाराशिव केले व अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यात आले. असे असतानाही शासकीय कामांमध्ये व कागदपत्रांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख 'औरंगाबाद' करण्यात येत असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी निदर्शनास आणले आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले की, नामांतराचे ढोल वाजवणाऱ्या भाजप-शिंदे-पवार सरकारच्या नाकाखाली, महसूल विभागाच्या कागदपत्रांवर अजूनही 'औरंगाबाद' नाचतेय. ही अधिकाऱ्यांची 'मोगली मानसिकता' आहे आणि सरकारचा दुटप्पीपणा असल्याची टीका दानवे यांनी केली आहे. तसेच अंबादास दानवे पुढे म्हणाले, एकीकडे नावावरून निधी रोखण्याची धमकी द्यायची आणि दुसरीकडे सरकारी जीआरमध्ये औरंगाबादचीच शाई वापरायची; हा 'आंधळेपणा' नसून मुघल सरंजामशाहीचा प्रभाव आहे. तुमचे मंत्रालय आता शासन निर्णय कमी आणि शाही फर्मान अधिक काढते, असा टोला दानवे यांनी लगावला आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत शासन निर्णयाचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये 'औरंगाबाद' असा उल्लेख केल्याचे दिसून येत आहे. अंबादास दानवे यांनी शेअर केलेला शासन निर्णय हा महसूल विभागाचा आहे. यात राज्यातील सहाही महसूल विभागातील महसूल यंत्रणेतील सर्व कार्यालयातील विविध संवर्गातील पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याचा प्रस्ताव त्यावर शासनाने निर्णय घेतला आहे. यात विभागीय आयुक्तालयात 6 महसूल विभागांची नावे दिली आहेत. त्यात कोकण, पुणे, नाशिक, 'औरंगाबाद', अमरावती आणि नागपूरचे नाव आहे. यात विशेष लक्ष वेधले ते छत्रपती संभाजीनगरच्या जुन्या नावाने. यावरूनच अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्रात मतदान संपल्यानंतर तब्बल 76 लाख वाढीव मतदान झाल्याचा दावा त्यांनी केला असून, आंध्र प्रदेशातील रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मतदानाला 'फ्रॉड' निर्मला सीतारमण यांच्या पतीने बोगस ठरवल्याचे त्यांनी म्हटले आहे. याच धर्तीवर आगामी काळात तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निकालांचे चित्र फेरफार करून भाजपच्या पथ्यावर पाडले जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी ममता बॅनर्जी, स्टॅलिन आणि काँग्रेससारख्या विरोधी पक्षांनी निवडणूक रिटर्निंग ऑफिसरला कठोर तंबी देऊन निवडणूक यंत्रणेवर वचक निर्माण करावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. नेमके आंबेडकर काय म्हणाले? प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तब्बल 76 लाख वाढीव मतदान झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार अत्यंत संशयास्पद असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती डॉ. परकला प्रभाकर यांनीदेखील आंध्र प्रदेश निवडणुकीबाबत असेच दावे केले आहेत. आंध्र प्रदेशात रात्री 9 ते पहाटे 2 वाजेपर्यंत मतदान झाले आणि तो निकाल 'फ्रॉड' असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ही परिस्थिती लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले. आगामी निवडणुकांबाबत भाकीत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जर हीच परिस्थिती कायम राहिली आणि निवडणूक यंत्रणेवर वचक बसवला नाही, तर तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निकालांचे चित्र अनपेक्षितरीत्या बदलू शकते, असा इशारा आंबेडकरांनी दिला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234 जागा आहे. यामध्ये AIADMK 150 जागा जिंकू शकते, तर भाजप 25 जागांवर विजय मिळवेल. सत्ताधारी स्टॅलिन, काँग्रेस आणि टीव्हीके पक्षाला मोठा फटका बसू शकतो. तर केरळमध्ये भाजप किमान 15 जागा जिंकण्याची शक्यता आहे. आसाममध्ये 126 जागा असलेल्या विधानसभेमध्ये भाजप 90 ते 92 जागा जिंकू शकते. तर ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये 294 पैकी भाजप 180 ते 200 जागा जिंकण्याची शक्यता आंबेडकर यांनी वर्तवली आहे. तर पाँडिचेरीमध्ये भाजप आणि मित्रपक्ष मिळून 20 जागा जिंकू शकतात, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. रिटर्निंग ऑफिसरला तंबी द्या प्रकाश आंबेडकर यांनी ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल), एम.के. स्टॅलिन व विजय (तामिळनाडू), आणि केरळ व आसाममधील काँग्रेस व डाव्या पक्षांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. जर हे निकाल बदलू द्यायचे नसतील, तर सर्व विरोधी पक्षांनी आतापासूनच दक्षता घ्यावी. प्रत्येक निवडणूक रिटर्निंग ऑफिसरला स्पष्ट तंबी द्यावी की, जर कायद्यानुसार काम झाले नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आंबेडकर म्हणाले.
पुणे, प्रतिनिधी- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील तीन कर्मचाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. उपशिक्षक पदावर पदोन्नतीसाठी 3 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या प्रकरणात एक सहाय्यक प्रशासन अधिकारी आणि दोन कनिष्ठ सहायकांचा समावेश आहे. तक्रारदार (वय 36) हे जिल्हा परिषद पुणे येथे शिक्षण सेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची उपशिक्षक पदावर पदोन्नती होण्यासाठी प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी आणि जात वैधता प्रमाणपत्र नसतानाही अधिसंख्य पदावर वर्ग करून सेवा व निवृत्ती लाभ मिळवून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्यांनी 3 लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार 6 जानेवारी 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीनंतर 11 फेब्रुवारी 2026 रोजी पडताळणी करण्यात आली. यामध्ये आरोपींनी 3 लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी यापूर्वीच 25 हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले होते आणि उर्वरित 2 लाख 75 हजार रुपयांची मागणी कायम ठेवली होती. या माहितीच्या आधारे नुकताच सापळा रचण्यात आला. बी.टी. कवडे रोड, हडपसर येथील 93 एव्हेन्यू मॉलसमोर सायंकाळी 4.59 वाजता तक्रारदाराकडून 2 लाख 75 हजार रुपये स्वीकारताना अनिल रंधवे आणि अतिश शिंदे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर सहाय्यक प्रशासन अधिकारी राजेश खंदारे यांनाही ताब्यात घेण्यात आले. या तिन्ही आरोपींविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांच्या पथकाने, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही शासकीय कामासाठी अधिकृत शुल्काव्यतिरिक्त लाच मागितल्यास तत्काळ ॲन्टी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
अमरावती - अकोला महामार्गावर सोमवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण अपघात झाला. त्यात चहा घेऊन परत येणाऱ्या 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, बेलोरा विमानतळाजवळ घडली. मृत्यूमुखी पडलेले सर्व तरुण बडनेराच्या जुनी वस्ती परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरा येथील 7 तरुण सोमवारी उशिरा रात्री चहा पिण्यासाठी बेलोरा विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चहा घेऊन ते परत येत असताना त्यांच्या कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर वेगात धडकली. या अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की, कारमधील 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. 4 जण जागीच ठार, 3 गंभीर या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे मोहम्मद अनस मोहम्मद सईद (20), मोहम्मद तल्हा मोहम्मद अनीस (22), मोहम्मद अवेझ मोहम्मद सईद (26) व अब्दुल अनवेस अब्दुल सलीम (22) अशी आहेत. हे सर्वजण बडनेरा जुनी वस्ती परिसरातील रहिवासी होते. एकाच भागातील चार तरुणांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत उर्वरित तीन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने अमरावती येथील बडनेरा रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघातात ट्रकचा सहभाग असल्याची माहिती या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले व पुढील कारवाई सुरू केली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी केली जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार, कार अनियंत्रित होऊन झाडावर धडकल्यामुळे हा अपघात झाला असावा, असे पोलिसांचे मत आहे. पण या अपघातात एका ट्रकचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस त्या अंगानेही या अपघाताची चौकशी करत आहेत. त्यांनी फरार ट्रक चालकाचा शोध सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे बडनेरा व आसपासच्या परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुण वयातच 4 तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बडनेरा पोलिसांनी मंगळवारी पहाटे या या अपघाताची नोंद करत पुढील तपास सुरू आहे. फरार ट्रकचालकाचा शोध घेणे व अपघातामागील नेमकी कारणे शोधणे हे सध्या पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे.
निवडणूक लढवू नका असे काही समजून सांगितले जात नाही, धमकी दिली जाते. साखर कारखाना, बँकेचे व्यवहार, सहकारी संस्था याबाबत कोणी समजून सांगत नाही. यात कोणते क्रांतीकारी काम आहे समजून सांगण्याचे? प्राजक्त तनपुरेंना समजून सांगायला रवींद्र चव्हाण आणि विखे पाटील गेले ते किती मोठे क्रांतीकारक आहेत? ते काय सेनानी आहेत का? तनपुरे काय महान सामाजिक कार्यकर्ते आहेत का? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, रवींद्र चव्हाण यांच्यावर निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप आहे. तर विखे पाटील यांचे जमीनीचे काही तरी प्रकरण आताच समोर आले आहे. हे काय समजून सांगणार. ही लोकं फाइल्स घेऊन जातात, माघार घ्या नाहीतर हे आमच्याकडे आहे अशा धमक्या देण्यासाठी ते जातात. कारखान्याला नोटीस देऊ, जे घाबरतात ते मागे जातात. सहज काही मिळत नसते धमक्यांना घाबरून राजकारण होत नसते. जे घाबरतात त्यांनी भाजपचे गुलाम आहोत असे मान्य करावे. आम्हाला हे मान्य नाही आम्ही भाजपला घाबरत नाही, देशात लोकशाही सुरू आहे. तेव्हा तुम्ही पिंपरीची निवडणूक लढवली होती संजय राऊत म्हणाले की, बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार दिला यावर शरद पवारांनी व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे. शरद पवारांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्यांच्यासोबत काम केले आहे. पक्ष जराी सोडला तरी त्यांची विचारधारा काँग्रेसची आहे. त्यांनी त्यांचे राजकारण काँग्रेसच सोबतच केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कौटुंबिक कारणामुळे ती जागा लढत नसल्याने काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे.याचा अर्थ दुसरे कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवू नको म्हणून दबाव का आणायचा.पार्थ पवारांच्या वडीलांनी पिंपरी चिंचवड निवडणूक लढवलीच होती लक्ष्मण पवारांच्या निधनानंतर. काँग्रेसच्या मदतीने ते ती निवडणूक लढले होते, याची आठवण राऊतांनी करूण दिली. मुख्यमंत्र्यांना जाग आली आहे का? संजय राऊत म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाची संघर्षगाथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि त्यातून सातत्याने प्रेरणा मिळत रहावी यासाठी उद्धव ठाकरेंच्या प्रेरणेतून संयुक्त राष्ट्र दालनाची निर्मिती झाली. त्या दालनाचे उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. भाजपच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये त्या दालन तुटले, त्यांचे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांना त्याकडे लक्ष द्यावे असे वाटले नाही हे 106 हुतात्माचे दुर्दैव आहे. मराठी माणसासाठी शिवसेनेने बरेच काही केले, पण तुमच्या काळात इतिहास सडवण्याचे काम सुरू आहे. मनपाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर गेल्या त्यांनी त्याची परिस्थिती दाखवली. यानंतर तरी मनपाना आणि मुख्यमंत्र्यांना जाग आली आहे का? असा सवाल राऊतांनी केला आहे. जय महाराष्ट्र म्हणायचा अधिकार नाही संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ एकडे तिकडे फिरत असते. अनेक प्रकल्पावर घोषणा करत असते, त्यांनी संयुक्त राष्ट्र दालनाची अवस्था स्वत: जाऊन बघावी आणि ती सुधारावी असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत नसेल तर त्यांचे महाराष्ट्र प्रेम बेगडी आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही राऊतांनी म्हटले आहे. मनपाला काय भीक लागली आहे का? शिवसेनेच्या कार्यकाळात मनपाच्या 90 हजार कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या, त्या मोडून मोडून तुम्ही खात आहात. हजार कोटी रुपयांची कंत्राटे रद्द केली. पण हे सर्व सुरू असताना सर्वांना संयुक्त महाराष्ट्र भवनाचा विसर पडला आहे. का जय महाराष्ट्र म्हणता तुम्हाला तो अधिकार नाही.
स्वतःला पत्रकार आणि कन्सल्टंट म्हणवून घेणाऱ्या रवींद्र नारायण एरंडे (63) याच्या लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या प्रकरणाने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडवून दिली असून, पीडित महिलांच्या तक्रारींनंतर त्याच्या पोलिस कोठडीत 10 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी एरंडेच्या कार्यालयातून सापाची कात आणि पक्ष्यांचे अवयव जप्त केल्याने, सुशिक्षित आणि प्रतिष्ठित मुखवटा ओढलेल्या या नराधमाचा भोंदूगिरीचा काळा चेहराही आता समोर आला आहे. दरम्यान, न्यायालयातून बाहेर पडल्यावर अशोक खरातप्रमाणेच 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला'च्या घोषणा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशोक खरातच्या प्रकरणाप्रमाणेच रवींद्र एरंडेने देखील महिलांना विविध आमिषे दाखवून भोंदूगिरी केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. सातपूर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता, तेथे सापाची कात, पक्ष्यांचे अवयव आणि कवडी यांसारख्या संशयास्पद वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. या वस्तूंचा वापर तो महिलांना वश करण्यासाठी किंवा त्यांना भीती घालण्यासाठी करत असावा, असा संशय पोलिसांना असून त्यादृष्टीने कसून तपास सुरू आहे. तसेच पोलिसांनी त्याच्या कार्यालयातून आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत. तपासादरम्यान एरंडेच्या जाळ्यात अडकलेल्या 8 महिलांची ओळख पटली असून, पोलिसांनी आवाहन केल्यानंतर अनेक पीडितांनी धैर्याने पुढे येत आपली कैफियत मांडली आहे. नोकरीचे आमिष दाखवून किंवा विविध प्रकारे फसवणूक करून या महिलांची शारीरिक आणि मानसिक पिळवणूक केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिस सध्या या महिलांची गोपनीयता राखून त्यांचे प्रबोधन करत आहेत, तसेच त्यांच्या तक्रारी रीतसर नोंदवून घेण्याची कायदेशीर प्रक्रिया अत्यंत संवेदनशीलतेने राबवली जात आहे. एरंडेकडूनही 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला'च्या घोषणा सोमवारी (6 एप्रिल) पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी न्यायालयाला तपासातील प्रगतीबाबत सविस्तर माहिती दिली, ज्याची दखल घेत न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून रवींद्र एरंडेच्या कोठडीत 10 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. विशेष म्हणजे, न्यायालयातून बाहेर पडताना आपली ओळख लपवण्यासाठी चेहरा झाकून घेतलेल्या एरंडेने नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला अशी घोषणाबाजी केल्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त होत होते. या प्रकरणातील भोंदूगिरी आणि लैंगिक शोषणाचे धागेदोरे आता अधिक खोलवर तपासले जात आहेत.
भोंदूबाबा ऋषीकेश वैद्यला न्यायालयीन कोठडी:प्रसादातील गुंगीकारक औषधाची माहिती देण्यास आरोपीचा नकार
भोंदूबाबा ऋषीकेश वैद्यला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दैवी अवतार असल्याची बतावणी करणाऱ्या वैद्यवर एका महिलेला प्रसादातून गुंगीकारक औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. प्रसादात नेमके कोणते औषध मिसळले आणि ते कोठून खरेदी केले, याबाबत आरोपी माहिती देत नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवला आहे. ऋषीकेश श्रीकांत वैद्य (वय 39, रा. वसई, पालघर) याच्याविरोधात बलात्कार आणि धमकावणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, एका 35 वर्षीय महिलेने वसईतील माणिकपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मांजरी पोलिस या गुन्ह्याचा तपास करत आहेत. आरोपी वैद्यच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला वानवडी येथील लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीची लैंगिक सक्षमतेची चाचणी करण्यात आली आहे. तसेच, आरोपी पीडितेला मांजरी आणि वसई येथील ज्या लॉजमध्ये घेऊन गेला होता, तेथेही तपास करण्यात आला आहे. गुन्ह्यासाठी वापरलेली चारचाकी जप्त करणे, पीडितेची आक्षेपार्ह छायाचित्रे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये आहेत का, याचा तपास करणे आणि आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबत चौकशी करणे बाकी आहे. यासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. बचाव पक्षातर्फे ॲड. साजिद शाह, ॲड. दिगंबर देसाई आणि ॲड. पवन कुलकर्णी यांनी पोलिस कोठडी वाढवण्यास विरोध केला. सरकारी पक्षाने जुनीच कारणे दिली असून, आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद त्यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने वैद्यच्या पोलिस कोठडीत चौकशीचा अधिकार अबाधित ठेवून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपी वैद्य धर्मगुरू असल्याने त्यांच्या डोक्यावरील शिखा (शेंडी) हा धार्मिक प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाला वैद्य यांची शेंडी न कापण्याचे आदेश द्यावेत, असा अर्ज वैद्यच्या वकिलांनी केला. यावर न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारागृह प्रशासनाशी संपर्क साधून आरोपीची शेंडी न कापण्याचे आदेश दिले, अशी माहिती ॲड. साजिद शाह यांनी दिली.
राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समुदायाला अल्पसंख्याक दर्जा सोडून हिंदू म्हणून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. लोढांच्या या वक्तव्यावर जैन समुदायातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी या विधानाचा कडक शब्दांत निषेध केला आहे. लोढांनी जैन समाजातील कोणालाही विश्वासात न घेता हे वक्तव्य केले. त्यांचे हे विधान अज्ञानमूलक आहे किंवा ठरवून आखलेल्या भूमिकेचा भाग असल्याची टीका गांधी यांनी केली आहे. ललित गांधी म्हणाले, जैन धर्म हा भारतातील एक स्वतंत्र, प्राचीन आणि वैज्ञानिक तत्त्वज्ञान आहे. त्याचे स्वत:चे तीर्थंकर, स्वत:ची तत्त्वमीमांसा आणि मोक्षपरंपरा आहे. आम्ही हिंदू संस्कृतीचे पालनकर्ते आहोत. परंतु, जैन धर्म हा हिंदू धर्माची शाखा किंवा उपशाखा नाही. धर्म आणि संस्कृती या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जैन धर्मियांना मिळालेला अल्पसंख्याक दर्जा ही कोणतीही भीक नसून आमचा घटनात्मक अधिकार आहे. पुढे बोलताना ललित गांधी म्हणाले, अल्पसंख्याक दर्जा हा एकप्रकारे आमच्या वेगळ्या ओळखीचा सन्मान आहे. हा दर्जा सोडणे म्हणजे स्वत:च्या अस्तित्त्वालाच नाकारणे. अशा कोणत्याही विचारसरणीला आम्ही सर्व स्तरांवर विरोध करू. हा घटनात्मक अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न पूर्ण ताकदीने हाणून पाडला जाईल. हा दर्जा जैन समाजाच्या ऐक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. जैन समाज आता शांत बसणार नाही, हे लोढा यांनी समजून घ्यावे, असा इशारा गांधी यांनी दिला आहे. काय म्हणाले होते मंगलप्रभात लोढा? मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले होते की, जैन धर्म हा मूळ हिंदू संस्कृतीचाच अविभाज्य भाग आहे. मुघल, इंग्रज आणि त्यानंतर काँग्रेसने आपल्या 'फूट डालो आणि राज करो' या कुटील नीतीने हिंदू समाजाचे तुकडे केले. आता ही गुलामगिरीची मानसिकता आणि अल्पसंख्याक दर्जा झुगारून मूळ प्रवाहात येण्याची वेळ आली आहे. एकेकाळी दक्षिण भारतात 22 ते 23 टक्क्यांच्या आसपास असणारा जैन समाज आज केवळ 3 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. ही केवळ आकडेवारी नसून एका मोठ्या राजकीय षड्यंत्राचा हा परिणाम असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. मुस्लिम समाजात अनेक जाती असूनही काँग्रेसने त्यांना संघटित ठेवले. मात्र, हिंदू समाजाला जाती-धर्माच्या कप्प्यात बंदिस्त करुन कमकुवत केले. पुढे बोलताना लोढा म्हणाले की, हा केवळ वैयक्तिक विचार नसून यावर समाजातील ज्येष्ठ मुनी आणि विचारवंतांशी चर्चा सुरु आहे. जर समाजात व्यापक सहमती निर्माण झाली, तर जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवता येईल. राम जन्मभूमी आंदोलनाप्रमाणेच आता पुन्हा एकदा 'आम्ही हिंदू' ही भावना प्रबळ करण्याची गरज असल्याचे मत लोढा यांनी व्यक्त केले होते.
गॅस सिलिंडर तुटवठ्यावरुन वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रात घेत सोमवारी चूल मांडो' आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच तालुक्याच्या ठिकाणी एकाच वेळी एल्गार पुकारत सरकारवर टीकास्त्र डागले. रस्त्यावर तयार केलेली भाकरी, मिरचीचा ठेचा असलेले ताट हातात घेऊनच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हे ताट अधिकाऱ्यांना दिले. सिलिंडर नसल्याने चुलीवर तयार असलेला भाकर-ठेचा गोड मानून घ्या, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. िसलिंडरचा तुटवडा नसल्याचा प्रशासनाकडून दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्ष स्थिती वेगळी असून, याच मुद्द्यावर वंचितने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात जिल्हा प्रमुख प्रमोद देंडवे, ज्ञानेश्वर सुलताने, मिलिंद इंगळे, महिला आघाडी अध्यक्ष आम्रपाली खंडारे, राजेंद्र पातोडे, गजानन गवई, नगरसेवक पराग गवई, शेख मकर, शोभा शेळके, चंद्रशेखर चिंचोळकर, संगीता अढाऊ, राजकुमार दामोदर, प्रा. मंतोष मोहोड, नितीन सपकाळ, बुद्धभूषण इंगोले आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितने मंडप थाटले. यात रिकामे सिलिंडर ठेवण्यात आले. सर्वात पुढे दोन मातीच्या चुली तयार करण्यात आल्या. चुलीची पूजा करून चूल मांडो' आंदोलन सुरू झाले. ज्वारीची भाकर, ठेचा तेथेच तयार करण्यात आला. ‘नरेंदर कब मिलेगा गॅस सिलिंडर’, ‘देवेंदर कब मिलेगा गॅस सिलेंडर’, अशा घोषणा देत आंदोलकांनी हातात फलकही धरले. काही वेळ रस्त्यावरच तयार केलेली भाकरी-ठेचा खात आंदोलकांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटला मंडप; सरकारविरोधात दिल्या घोषणा सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनिती लोकसभा, विधानसभेसह अन्य निवडणुकांमध्ये वंचितने निवडणूक चिन्ह गॅस सिलिंडर होते. हाच धागा धरत चूल मांडो आंदोलनात ‘जर निवडणुकीत गॅस सिलिंडर निवडला असता तर आज किचनमध्ये गॅस सिलिंडर असता’, असे फलक वंचितच्या कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील पाचपैकी एकाही मतदारसंघात विजय झाला नाही. आता गॅसच्या मुद्द्यावरुन वंचितने सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी गॅस एजन्सीबाहेर एका वृद्धाच्या झालेल्या मृत्युवरुनही वंचितने आक्रमक भूमिका घेतली होती. आता अन्य विरोधी पक्ष सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या गॅसच्या प्रश्नावर मूळ गिळून बसले असतानाच वंचितने मात्र रस्त्यावरील लढाई सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरुन राजकीय पक्षांमध्ये जोरदार राजकीय कुरघोडी होणार आहे.
सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक सेवा कार्यात सक्रिय असणाऱ्या युवकांच्या गोरक्षण रोडचा राजा- विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने द्वितीय श्रीश्याम संकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात राष्ट्रीय भजनकार सहभागी होणार असून शहरात भक्तीभाव निर्माण होणार आहे. रामदेवबाबा- श्यामबाबा मंदिरात मंडळाच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत श्रीश्याम संकीर्तन महोत्सवाबाबतची माहिती देण्यात आली. शुक्रवार, १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता मूर्तिजापूर रोडवरील सिटी स्पोर्ट क्लबच्या प्रांगणात हा द्वितीय श्री श्याम संकीर्तन महोत्सव होणार आहे. मंडळाच्या वतीने गतवर्षी अशाच प्रकारचा प्रथम श्याम संकीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये राष्ट्रीय भजनकार राज पारीक उपस्थित होऊन त्यांनी संगीतमय भजने सादर केली होती. यंदाही भजनांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीश्याम संकीर्तन महोत्सवाच्या समाप्तीनंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. श्री श्याम संकीर्तन महोत्सवाचा भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. या पत्रकार परिषदेत मंडळाचे मार्गदर्शक सुधीर रांदड, संजय शर्मा, मुरलीधर उपाध्याय, अॅड. सौरभ शर्मा, राजू शर्मा बालाजी, प्रथमेश शर्मा, मधूर बिसेन, सिमरनजीतसिंह बछेर, श्रीकांत इंदोरीया, मुकेश शर्मा, अनमोल बछेर, सुनील कोरडीया आदी उपस्थित होते. श्यामबाबांचा दरबार: श्रीश्याम संकीर्तन भजन महोत्सवाचे आकर्षक व भक्तिमय श्री श्यामबाबांचा दरबार निर्माण करण्यात येणार असून यामध्ये फुलांची व सुवासिक अत्तरांची वर्षा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या प्रारंभ प्रसंगी भव्य आतिषबाजी करून मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे. श्रीश्याम संकीर्तन भजन महोत्सवात स्थानिक भजनकार गोपाल शर्मा हारे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी निर्माण केलेल्या गोरक्षण का राजा-या गीताच्या चित्रफितीचा अनावरण सोहळा होणार आहे. श्रीश्याम संकीर्तन या राष्ट्रीय संकीर्तन महोत्सवात राष्ट्भरातील खाटू नरेश श्याम भक्तात प्रसिद्ध असणारे तीन बाण के धार' या भजनाने राजस्थान येथील प्रसिद्ध भजनकार छोटूसिंग रावणा हे प्रथमच शहरात येत असून श्याम भजनांची वर्षा भक्तांवर करणार आहेत. त्यांच्या समवेत राजस्थान येथील श्यामबाबाचे पावन खाटू धाम येथील सेवक परिवार आलूसिंह व मोहनदास यांचे वंशज सेवाधारी भजनकार महाराज शामसिंह चौहान यांची उपस्थिती व इंदूर येथील बासरी वादक देव कनेरी यांची साथसंगत लाभणार आहे.
न्यू राधाकिसन प्लॉट व जुना आळशी प्लॉट येथील नागरिकांच्या वतीने हिंदू संमेलन आयोजन करण्यात आले. भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थान व संवर्धनासाठी हिंदू संमेलनाची जागोजागी आवश्यकता असून अशा संमेलनाच्या माध्यमातून आपण आपल्या आदर्शमय परंपरा व धर्माचे योग्य प्रकारे रक्षण करू शकू, असा सूर संमेलनात उमटला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने मेहरबानू विज्ञान महाविद्यालयात आयोजित या संमेलनाचा प्रारंभ राणी सती धाम येथून शोभायात्रेने करण्यात आला. या शोभायात्रेत जुना आळशी प्लॉट व न्यू राधाकिसन प्लॉट परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. बँड बाजाच्या गजरात ही शोभायात्रा न्यू राधाकिशन प्लॉट, जुना आळशी प्लॉट परिसरातून मेहरबानू विज्ञान महाविद्यालयात या शोभायात्रेचे संमेलनात रूपांतर झाले. शोभायात्रेचे ठिकठिकाणी अनेक नागरिक व स्वयंसेवी संस्था, मंडळांनी उस्फूर्त स्वागत केले. न्यू राधाकिसन प्लॉटमध्ये या शोभायात्रेवर समाजसेवी कुंजीलाल जाजू, अनुसया जाजू व त्यांच्या कुटुंबाने पुष्प वर्षाव करत शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत केले. संमेलनाचा प्रारंभ भारत माता प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आला. यात प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू सेवा संघाचे महाराष्ट्र प्रभारी हनुमान गढी अयोध्या येथील सुनील महाराज, हिंदू जागरण मंचाच्या वक्त्या अॅड. ममता तिवारी, पंडित सुदर्शन शर्मा तर प्रमुख वक्ते म्हणून रुपेश शाह आदी उपस्थित होते. सर्वप्रथम न्यू राधाकिसन प्लॉट व जुना आळशी प्लॉट येथील नागरिकांच्या वतीने पाहुण्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. बालिका खुशी जोबनपुत्रा हिच्या गणेश वंदनाने व बालिका अनुष्का शर्मा हिच्या द्रोपदी वस्त्रहरण गीत नाट्याने या संमेलनास प्रारंभ करण्यात आला. सूत्रसंचालन शालिनी पिंपळे, दीपिका ठाकूर यांनी तर आभार धर्मेश वैद्य यांनी मानले.वंदे मातरम ने या संमेलनाची सांगता झाली. हनुमान चालिसाचे पठण संमेलनात मातृशक्तींनी हनुमान चालिसा पठण करून ऊर्जा निर्माण केली. यावेळी शताब्दी पार करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा कार्याची माहिती देण्यात आली. सुनील महाराज, पंडित सुदर्शन शर्मा, प्रमुख वक्ते रुपेश शाह आदींनी आपले विचार व्यक्त करीत हिंदू संमेलनाची उपयुक्तता प्रतिपादित करीत नागरिकांनी स्वयंपूर्ण धर्म रक्षणासाठी जागृत होऊन धर्माची पताका समाजात गतिमान करण्याचे आवाहन केले. पं सुदर्शन शर्मा यांनी हिंदू संमेलनाची आवश्यकता का आहे याची विमांसा करीत आजच्या परिस्थितीत हिंदूंचे एकत्रीकरण ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
जुने शहरातील सोनटक्के प्लॉट परिसरात अतिक्रमणाच्या वादावरून एकाच समुदायातील दोन गटांत सोमवारी रात्री तुफान हाणामारी झाली. या घटनेला हिंसक वळण लागले. दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी झाली. शिवीगाळही झाली. त्यानंतर परिस्थिती चिघळली. दोन्ही गट आमने-सामने आले. या दरम्यान दोन्ही बाजूंनी तलवार, लोखंडी पाईप, कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर झाला. या हल्ल्यात दोन्ही गटांतील सहा जण जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचालित सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अतिक्रमणाच्या वादातून सशस्त्र हाणामारी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सोनटक्के प्लॉट येथील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद काही वेळातच उग्र झाला. दोन्ही गटांतील व्यक्तींनी एकमेकांना शिवीगाळ केली. हाणामारी सुरू झाली. यावेळी काही जणांनी तलवार, लोखंडी पाइप तसेच कोयत्याचा वापर करून हल्ला केल्याचे गंभीर जखमी रुग्णाचा मुलगा शेख इब्राहिम शेख जमील कुरेशी याने सांगितले. सहा ते सात लोकांनी आपल्या वडिलांवर तलवारीने हल्ला केला. यावेळी घरातील महिलाही जखमी झाल्याचे त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले. जखमींना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात मोठा जमाव जमला होता. नियंत्रणासाठी मोठी पोलिस कुमक बोलावण्यात आली होती. जखमींची नावे समजू शकली नाहीत. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिस तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री बारापर्यंत सुरू होती. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांचा धाक संपला ? दरम्यान, गेल्या आठवड्यापासून शहरात खून, हाणामाऱ्याच्या घटना वाढल्याने पोलिसांवरील ताणही वाढला आहे. शहरात किरकोळ कारणांवरून सशस्त्र हाणामाऱ्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये कायद्याचा धाक संपला का, अशा चर्चा रंगत आहेत. कारण अल्पवयीन मुलांच्या टोळ्या शहरात मुजोरी करत आहेत. एकुणच गेल्या महिनाभरात जिल्ह्याचा क्राइम रेटही वाढता आहे. पोलिस अधीक्षकांनी ही गंुडागर्दी मोडून काढण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी सुज्ञ अकोलेकरांची अपेक्षा आहे.
यंदा उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, गारपीटमुळे पिकांची प्रचंड हानी झाली असून तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सोमवारी केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. गतवर्षी खरीपनंतर रब्बीमध्येही अवकाळी पाऊस झाला. मात्र पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने यंदाचा उन्हाळा कमी जाणवेल, असा सामान्यांचा अंदाज होता. मार्च महिन्यात पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आला. अशाच काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सत्रच सुरू झाले. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक कर्जाचा डोंगर आणखी वाढणार आहे. दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेने ६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी वर्षा मिना यांना निवेदन सादर केले. जिल्ह्यात ३० मार्च, ९ एप्रिल, ३ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारांमुळे जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, कांदा बियाणे, तीळ, उन्हाळी मूग, टरबूज, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तरी तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून ती सरसकट घोषित करण्यात यावी; अन्यथा संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, मंगेश गावडे, रामहरी आगळे, रमेश चिचे, शेख मुख्तार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. गतवर्षी शेतमालाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे पुढील आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. त्यामुळे सरसकट कर्जमाफीची मागणी होत आहे. जिल्ह्यात जून महिन्यात अतिवृष्टीमुळे ४ हजार २१५ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली. १६३ गावांमधील ७ हजार ५७७ शेतकऱ्यांचे ६ कोटी ५ लाख ५६ हजारांचे नुकसान झाले होते. हा निधी मंजूर झाला. जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा फटका ७ हजार ३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना बसला होता. ११ हजार ५९७ शेतकऱ्यांचे ६ कोटी २१ लाखांचे नुकसान झाले होते. या दोन्ही महिन्यांची मदत मंजूर झाली. ऑगस्ट महिन्यात १ लाख ६ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली होती. अतिवृष्टीचा फटका १ लाख २० हजार ६९७ शेतकऱ्यांना बसला. मदतीसाठी ९२ कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली. ही मागणीही मंजूर झाली. जिल्ह्यात यंदा सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसान भरपाईसाठी वाढीव क्षेत्राकरिता सर्वात शेवटी २३ कोटी ३७ लाख मंजूर झाले होते. याचा लाभ २१ हजार २९३ शेतकऱ्यांना मिळत आहे. ही वाढीव मदत २६ हजार ८८९ हेक्टर क्षेत्रासाठी आहे. यापूर्वी १ लाख ७२ हजार ८७५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी १६२ कोटी ९५ लाख मंजूर झाले. राज्य शासनाने पीक नुकसान, पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेले ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेज जारी केले होते. यात जमीन महसुलात सुट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शाळा, महाविद्यालय परीक्षा शुल्कात माफी, रोहयो कामात शिथिलता, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदींचा समावेश होता. आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात केली आहे. अवकाळी पावसामुळे १२२ हेक्टरवर नुकसान जिल्ह्यात २० मार्च रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने १२२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला होता. २.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. मंगळवार, ३१ मार्च रोजी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी ६५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. अर्थात ही आकडेवारी नजर अंदाजाच्या प्राथमिक पाहणीनंतर पुढे आली होती. तिसऱ्यांदा ३ एप्रिल रोजी पुन्हा अवकाळी पाऊस पडल्याने २६८ हेक्टर क्षेत्रातील पिकं उद्ध्वस्त झाली.
गॅस पुरवठ्यावरून केंद्र सरकार, राज्य सरकार म्हणत आहे की, परिस्थिती सर्वसामान्य आहे. मग सांगा अद्यापही नागरिक गॅस सिलेंडरसाठी रांगेत का उभे आहेत, असा सवाल वंचितने जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर केलेल्या निवेदनात केला आहे. आपण आपल्या एसी ऑफिसमधून बाहेर पडावे आणि बाहेरील परिस्थिती बघावी. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा काळा बाजार होत आहे. सिलिंडर ५ ते ७ हजार रूपयांचा मिळत आहे. त्यामुळे कोणतेही संकट नाही, असा सरकारकडून होणारा दावा खोटा आहे, अशा शब्दात वंचितने सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. गत कही दिवसांपासून अमेरिका व इस्त्रायलने इराणवर हल्ला केला असून, आखाती देशांमध्ये युद्ध छेडले आहे. याचा परिणाम गॅस पुरवठ्यावर आहे. गॅस सिलिंडर मिळण्यासाठी नागरिक गॅस एजन्सी बाहेर रांग लावत आहेत. ऑनलाईन बुकींग होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. अनेक कुटुंब गॅस मिळत नसल्याने शहर सोडत आहे कामधंदे सोडून तासंतास गॅस मिळण्याकरिता गॅस एजन्सी समोर उभे राहावे लागत आहेत. दरम्यान ६ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीने चूल मांडो आंदोलन करीत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या करण्यात आल्या मागण्या वंचितने निवेदनातून पुढील मागण्या केल्या. गॅस सिलिंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी. गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखावा. संबंधितांंवर कठोर कारवाई करा. २५ दिवसानंतर गॅस मिळेल, ही अट शिथिल करण्यात यावी. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करावेत. सरकारकडून प्रत्येक २ किलोमीटरवर जेवणाची व्यवस्था करून गरजू लोकांना अन्न देण्यात यावे. अनेक ठिकाणी केवायसी होत नसल्याने सिलिंडर देण्यात नाही. त्यामुळे अशा ग्राहकांना तातडीने गॅस देण्यात यावा. जिल्ह्यामध्ये उज्वला गॅस योजनेअंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले आहेत, याची माहिती देण्यात यावी.
बीड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या एकूण 88 ग्रामपंचायतींच्या जागांसाठी आजपासून पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. सदस्य किंवा सरपंचांचे निधन, राजीनामा आणि अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या 16 सरपंच आणि 72 सदस्य पदांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये विशेषतः केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, प्रशासकीय स्तरावर या प्रक्रियेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार, इच्छूक उमेदवारांना 13 एप्रिलपर्यंत आपले नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया 28 एप्रिल रोजी पार पडणार असून, 29 एप्रिल रोजी मतमोजणी होऊन अंतिम निकाल घोषित केला जाईल. पुढील काही दिवस जिल्ह्यातील या 88 गावांमध्ये राजकीय हालचालींना वेग येणार असून गावपातळीवरील सत्तासंघर्ष पाहायला मिळणार आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी चर्चा ग्रामपंचायतच्या निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. याबाबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटले की, स्वर्गीय संतोष देशमुख यांनी जे काम केले आहे, तोच मानस गावकऱ्यांचा असणार आहे. गावकऱ्यांच्या विचारावर आम्ही थांबलेलो आहोत. येणाऱ्या दोन-तीन दिवसात काही गोष्टी स्पष्ट होतील. आजी-माजी सदस्य पॅनल प्रमुख गावकऱ्यांची बैठक झाली. यात निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी चर्चा झाली. माझ्या वहिनीला सरपंचपदाचा अनुभव पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, 18 महिन्यांचा उरलेला कालावधी स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली म्हणून बिनविरोध करण्याचा मानस आहे. गावाच्या विकासासाठी टीम वर्कची गरज असते. स्वर्गीय देशमुखांनी पंधरा वर्ष गावासाठी घातले आहे. या निवडणुकीसाठी शक्यतो मी उमेदवार नाही. माझ्या वहिनीला सरपंचपदाचा आणि बाजार समितीच्या सदस्यपदाचा अनुभव आहे. त्यांना विचारात घेऊन गावकऱ्यांनी बैठक घेतलेली आहे.येत्या एक-दोन दिवसात निवडणूक बिनविरोध कशी होईल? हा गावकऱ्यांचा प्रयत्न असेल. मला संतोष देशमुख यांची केस महत्त्वाची मला कुठल्याही प्रकारची भीती नाही. पण, मला संतोष देशमुख यांची केस महत्त्वाची आहे. मला केसला वेळ द्यायचा आहे. मला कुठला दबाव नाही. मला कुठली अपेक्षा नाही आणि भीतीही नाही, असेही धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या दोन-तीन दिवसात आम्ही सर्वजण बसून तोडगा काढणार आहोत. देशमुख कुटुंबावर आलेले संकट कुणी संधी म्हणून बघू नये. उरलेल्या कालावधीत संतोष अण्णांचे स्वप्न पूर्ण करावे, असे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
गॅस सिलिंडर मिळण्यासाठी नागरिकांना असुविधा होणार नाही, दृष्टीने पुरवठा विभाग व गॅस एजन्सीने नियोजन करावे असे स्पष्ट, आमदार रणधीर सावरकर यांनी बैठकीत दिले. गॅस सिलींडरबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार व अधिकाऱ्यांची बैठक झाली. ग्राहकांच्या अडचणी तसेच गॅस एजन्सी यांच्या अडचणी, कायदा सुव्यवस्था तसेच वेगवेगळ्या विषयावर प्रशासन म्हणून उपाययोजना आदींबाबत बैठक पार पडली. गरजू गॅसधारक आपल्या हक्कांपासून वंचित राहिला पाहिजे नाही या दृष्टीने अन्नपुरवठा विभाग तसेच गॅस डीलर्स यांनी नियोजन करावे असे निर्देश आमदार सावरकर यांनी दिले. बैठकीत ग्राहकांच्या अडचणी संदर्भात सविस्तर चर्चा झाली. बैठकीला प्रामुख्याने जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र ऐन्नावार आदीसह कंपनीचे प्रतिनिधी होते. बैठकीत लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी मुद्दे मांडले. यात ओटीपी टक्केवारी आणि मेसेज न येणे, पुरवठा संभाजी नगर प्लांटवरून नियमित न होणे, प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी मुबलक पुरवणे, पुरवठा हा प्रतीक्षा यादीवर निर्भर असावा, इंडेन गॅस मनपा हद्दवाढ क्षेत्रात ग्रामीण वितरक आल्यामुळे बुकिंग अवधी २५ दिवसांची असावी., मॅन्युअल बुकिंग आणि थोडी शिथिलता देण्यात यावी, आदींचा समावेश होता. हद्दवाढ भागात अशीही समस्या शहरामध्ये बुकिंग २५-३० दिवसानंतर व ग्रामीणमध्ये ४५ दिवसानंतर होते. मात्र हद्दवाढ भागामध्ये ४५ दिवसानंतरच मिळत आहे. त्यामुळे हद्दवाढ भागातील ग्राहकांना २५-३० दिवसांनंतर मिळावे, अशी मागणी करण्यात आली. ग्राहकांचे बुकिंग आहे; पण ओटीपी न आल्यामुळे त्यांना सिलेंडर मिळत नाही. ते ऑफलाईन परवानगी द्यावे. एजन्सी धारकांच्या गाड्या प्लांटच्या बाहेर चार दिवसांपासून उभ्या आहेत. त्या लोड होत असून, ही समस्या दोन-तीन दिवसात सोडण्याचे आदेश बैठकीत देण्यात आला.
लग्नसराई तसेच सणासुदीला आयोजित विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर गावाकडील फुलांना बाजारात प्रचंड मागणी वाढल्याने तब्बल १५ ते २० टक्क्यांनी फुले महागली आहेत. उन्हाळ्यामुळे फुलांचे उत्पादन घटले सोबतच मागणी दुप्पट वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलेच चटक बसत आहेत. गेल्या काही दिवसांतील हवामानात सातत्याने होणारा बदल, उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसामुळे स्थानिक तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या फुलं उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. उत्पादन कमी झाल्याने जास्वंद, मोगरा, ताग, शेवंती, गुलाब, निशिगंध, दुर्वा यांसह पूजा-अर्चनेला लागणाऱ्या फुलांना मोठी मागणी असली तरी उत्पादन कमी असल्यामुळे हव्या त्या प्रमाणात पुरवठा करता येत नाही. परिणामी या फुलांचे भाव वाढल्याची माहिती फुलं उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. सणासुदीच्या काळात मंदिरांमध्ये, घरांमध्ये, तसेच विविध कार्यक्रमांना पुष्पहार, वेण्या, सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात फुले खरेदी केली जात असल्याने बाजारात फुले महागली आहेत. स्थानिक विक्रेत्यांच्या मते, “दरवर्षी सणासुदीच्या काळात मागणी वाढतेच, पण यंदा उत्पादन कमी असल्याने भाव अनियंत्रितरीत्या वाढले. ग्राहकांची मागणी पूर्ण करणे अवघड झाले आहे. गावातील तसेच बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी आठवडाभर हीच दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे. सण उत्सवामुळे खरेदी वाढली असून ग्रामीण बाजारपेठेमध्ये फुलांचा सुगंध अधिक ‘महाग’ झाल्याचे चित्र दिसत आहे. अंजनगाव बारी परिसरात फुलांचे असे आहेत दर शेवंती : १४०-१५० रुपये किलो गलंडा : ५०-६० रुपये किलो झेंडू : ९०-१०० रुपये किलो गुलाब : १५० रुपये किलो मोगरा (गजरा) : २० रुपये नग बिजली: १५० रुपये किलो निशिगंध : २५०-३०० रुपये किलो डचगुलाब : ३०० रुपये जुडी उडुपी माळा : २५०-३०० रुपये मागणी वाढली, उत्पादन घटल्याने अवक कमीच कधी कधी बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात असते. अशा वेळी दर कमी मिळतो. सहाजिकच शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडते. यावर्षी लग्नसराईच्या तोंडावर फुलांना चांगला दर मिळत आहे. ग्राहकांना परवडेल अशा दरात फुले दे ण्याचा प्रयत्न करतोय. - सुधीर तेटू, शेतकरी. अंजनगाव बारी.
मराठी गजलेला सातासमुद्रापार नेऊन अजरामर करणाऱ्या भीमराव पांचाळे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांची पुस्तकतुला करुन ती पुस्तके व ग्रंथसंपदा ठिकठिकाणच्या अभ्यासिकांना दिली जाणार आहेत. आगामी १० एप्रिल रोजी सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम होईल. इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसीएशनच्या स्थापनेनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला जोडूनच भीमराव पांचाळे यांची गजल मैफलसुद्धा रंगणार आहे. भीमराव पांचाळे हे अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. ते मोर्शी तालुक्यातील आष्टगाव येथील मूळ रहिवासी आहेत. त्यानिमित्त हा योग साधण्यात आल्याचे असोसीएशनचे अध्यक्ष नितेश राऊत व सचिव सूरज दहाट यांनी आज, सोमवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. राऊत म्हणाले, समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाचा एक भाग म्हणून असोसीएशनने हा कार्यक्रम घेतला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहणार असून महापौर श्रीचंद तेजवानी तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह पोलिस, महापालिका व इतर विभागांचे सर्व वरिष्ठाधिकारी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. असोसीएशनच्या मते भीमराव पांचाळे हे सुरुवातीपासूनच पुस्तक व ग्रंथप्रेमी आहेत. त्यामुळे त्यांचा अमृत महोत्सव साजरा करताना पुस्तकतुला केली जाणार असून ती पुस्तके व ग्रंथ जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिकांना दिली जाणार आहेत. जेणेकरुन भविष्यात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. यावेळी असोसीएशनचे मार्गदर्शक यशपाल वरठे, उपाध्यक्ष स्वप्नील उमप, सहसचिव अनिरुद्ध दवाळे, कोषाध्यक्ष अमोल देशमुख, संजय शेंडे, सुरेंद्र आकोडे, अमर घटारे, शुभम बायस्कर, अनिकेत दहातोंडे आदी उपस्थित होते. रसिक श्रोत्यांनी घेतला गजलचा अस्वाद जखमा कशा सुगंधी, अंदाज आरशाचा...मराठी गजल गायकीला अत्यंत वेगळा साज चढविण्यासाठी भीमराव पांचाळे प्रसिद्ध आहेत. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा..., तू नभातले तारे ...,आयुष्य तेच आहे...,मी किनारे सरकताना... अशा अनेक गजलांची मैफलही या कार्यक्रमानिमित्त ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांसह मान्यवर साहित्यिक आणि कानसेनांचीही मांदियाळी दिसून येणार आहे.
सिलिंडर तुटवड्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज, सोमवारी थेट जिल्हा कचेरीवरच चूल पेटवून भाकरी शिजविण्यात आली. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन सोपवून सिलींडर नियोजित वेळेत द्या, अशी मागणी करण्यात आली. वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक विजयकुमार चौरपगार आणि जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश बोरकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. अमरावतीसह सध्या देशभरात सिलींडरची टंचाई निर्माण झाली आहे. या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ या राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या हाकेला भारतीय बौद्ध महासभेनेही पाठिंबा दिला. त्यामुळे दोन्ही संघटनांनी मिळून संयुक्तपणे जिल्हा कचेरीवर निदर्शने केली. या निदर्शनादरम्यानच प्रचंड घोषणाबाजी करीत तेथेच चूल पेटवून भाकरी शिजविण्यात आल्या. आंदोलनात भारतीय बौद्ध महासभेचे संजय चोरपगार, आर. के. भटकर, मदन खंडारे, नयन मोंढे, बाबाराव गायकवाड, रमेश आठवले, शैलेश बागडे, सुरेश तायडे, अमोल जंजाळ, प्रशांत गजभिये, करण जाधव, अलंकार बागडे, आनंदराव इंगळे, विद्या तायडे, जया होमनेर, सोनू तायडे, सुधीर कांबळे, रीना गजभिये, अस्मिता बागडे, पुष्पा बोरकर, सुनिता रामटेके, मालती मेश्राम आदी अनेक कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते. घोषणाबाजीने दणाणला चौक नरेंदर..कब मिलेगा सिलेंडर, केंद्र सरकारचा निषेध असो, बाळासाहेब संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो आदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. कार्यकर्ते अगदी जोमात होते. सिलींडर मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी होत्या.
‘नरेंदर कब मिलेगा सिलिंडर' अशा संतप्तपणे घोषणा देत चुलीवर भाकरी करून प्रशासन तथा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गॅस टंचाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे वतीने तिवसा तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले. तसेच तहसीलदारांना भाकरी-कांद्याची भेट देण्यात आली. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरशिरसाट हे गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी रांगेत उभे असताना त्यांचा मृत्यू झाला होता. तसेच जिल्ह्यात रिद्धपूर येथेही एका तरुणाचा मृत्यू झाला होता. सिलिंडरच्या तुटवड्यामुळे स्वयंपाक घरात जेवण तयार करणे कठिणी झाले आहे. चहा टपरी, लहान व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली आहेत. खाणवळीत गॅस सिलिंडर नसल्याने अनेक विद्यार्थी शहरातून गावाकडे परत आले आहेत.अनेक ठिकाणी वाढीव दराने सिलेंडर विक्री सुरू असून त्याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर होत आहे. या ज्वलंत प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राजव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. प्रतिसाद म्हणून तिवसा तालुका वंचित बहुजन आघाडीचे वतीने तहसील कार्यालयासमोर चुलीवर भाकरी करून तहसीलदारांना भाकर व कांद्याची भेट दिली. याप्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी नायब तहसीलदार यांचे समोर तालुक्यात होत असलेल्या सिलेंडरचा टंचाई व काळाबाजार होत असल्याबाबत यावर कारवाई करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी केली. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दादा गडलिंग, युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते, जिल्हा सदस्य प्रमोद मुंद्रे, विनोद खाकसे, मुस्ताक शहा, डॉ. धर्मेंद्र दवाले, सिद्धार्थ कटरने, प्रवीण निकाळजे, अनिल सोनोने, नितीन थोरात, अवधूत सोनाने, मिलिंद खाकसे, अनिल गाडगे, रुपाली मुंद्रे, शांता कापसे, सोनाली पाटील, नलिनी अढाऊ, अलका कापसे, सुमन हेंडवे, वंदना कापसे, दुर्गा अढाऊ, वंदना कापसे, सविता दहाट, अनिता ढोके, राजकन्या ससाणे सह वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिल्याने तिवसा तहसील कार्यालयासमोर चूल मांडून भाकरी करत तहसीलदारांना भाकरी व कांदा भेट देत गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य जनतेला होत असलेल्या वेदनेचा आक्रोश मांडण्यात आला. तसेच तिवसा तालुक्यात होत असलेली कृत्रिम गॅस टंचाई व काळाबाजार तत्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा लवकरच सिलिंडरच्या गोडाऊन समोर आंदोलन करू असा इशारा सागर भवते यांनी यावेळी दिला.
स्वच्छता कंत्राटदार कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लि.सोबत मनपा प्रशासनाने केलेल्या करारनाम्यातील अटींचे परीक्षण करून त्यात आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात. प्रभागनिहाय आवश्यक मनुष्यबळ, वाहने व साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, दैनंदिन कचरा संकलन, वाहतूक व वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश स्वच्छता देखरेख समितीच्या पहिल्या बैठकीत देण्यात आले. महानगर पालिकेत स्थापन करण्यात आलेल्या स्वच्छता देखरेख समितीची बैठक सभागृह नेते चेतन गावंडे यांच्या अध्यक्षतेत सुदाम काका देशमुख सभागृहात सोमवार ६ रोजी दु. १ वाजता झाली या बैठकीत शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जीपीएस ट्रॅकिंग व बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.तसेच नवीन व सक्षम वाहनांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रभाग व झोननिहाय नियंत्रण प्रणाली अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. कंत्राटदाराकडून अॅक्शन प्लॅन व मायक्रो प्लॅनिंग घेण्याचे निश्चित करण्यात आले. सध्याच्या करारनाम्यात नमूद नसलेल्या काही कामांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये विशेषतः मनपा सार्वजनिक शौचालयांची नियमित साफसफाई, प्रभागांतर्गत फवारणी,जंतुनाशक फवारणी कामे, खुल्या जागांची स्वच्छता, तसेच नाल्या साफसफाईदरम्यान निर्माण होणारा कचरा तत्काळ उचलणे व विल्हेवाट लावणे या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश होता. स्वच्छता कामकाजात सातत्य राखण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. सदर बैठकीला महापौर श्रीचंद तेजवानी व उपमहापौर सचिन भेंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी समिती अध्यक्ष गटनेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, गटनेते नाना उर्फ ज्ञानेश्वर आमले, गटनेते शेख हमीद शेख वाहेद, गटनेते डॉ. राजेंद्र तायडे, अॅड.प्रशांत देशपांडे, माजी महापौर संजय नरवणे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, सदस्य बबलू शेखावत, अनिल अग्रवाल, प्रशांत वानखडे, दिनेश बुब, मंगेश मनोहरे, भोजराज काळे, अजय जयस्वाल, नजीब खान, नूतन भुजाडे, सुरेखा लुंगारे तसेच अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, वैद्यकीय स्वच्छता अधिकारी अजय जाधव, श्रीकांत चव्हाण, कार्यशाळा अभियंता स्वप्निल जसवंते व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोणार्कच्या कामात सुधारणेबाबत खल शहरात कचऱ्यावरून आगडोंब उसळला असताना तसेच यासंदर्भात अधिकारी, पदाधिकाऱ्यांना शहरवासीयांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याने कोणार्कच्या कामात सुधारणेसाठी नेमके काय करता येईल, यासंदर्भात बैठकीत मुख्यत्वे खल झाला. कारण, कोणार्कला व्यवस्थित काम करण्यासाठी ३ महिन्याची वेळ १४ मार्चपासून देण्यात आली आहे. या कालावधीत कोणार्कने किमान अपेक्षा पूर्ण करणे गरजेचे असल्याचेही सूर बैठकीत उमटले.
संतोष वाघमारे | टेंभुर्णी पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील चालू वर्षातील पाणीसाठा समाधानकारक म्हणजे ८५.१२ टीएमसी आहे. यामध्ये उपयुक्त पाणीसाठा २१.४७ टीएमसी म्हणजेच ४०.०७ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे २० टक्के म्हणजेच जवळपास १० टीएमसीने जादा आहे. दि. २५ एप्रिल रोजी नदीतून १२ दिवसांचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. तर योजनांद्वारे सोडले जाणारे पाणी सुरूच राहणार आहे. त्यामुळे यंदा पाणलोटातील सर्व योजना उन्हाळ्यात सुरू राहणार आहेत, अशी माहिती अभियंता प्रशांत माने यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाणलोटातील शिवार हिरवागार राहणार आहे. दि. ६ एप्रिल २०२५ रोजी मागील वर्षी याच दिवशी एकूण साठा ७४.८० टीएमसी तर उपयुक्त साठा ११.१४ टीएमसी (२०.७९ टक्के) होता. चालू वर्षी झालेला मुबलक पावसामुळे यंदा पाण्याची स्थिती समाधानकारक आहे. कालवा आणि इतर सिंचन योजनेतून पाण्याचे आतापर्यंत आवर्तन सुरू आहे. .कालव्याद्वारे : रब्बी हंगामात कालव्यातून ६.७० टीएमसी पाणी सोडले, उन्हाळी आवर्तनात आतापर्यंत ३.७८ टीएमसी पाणी वापरले, आवर्तन पूर्ण होईपर्यंत हे प्रमाण ६ ते ७ टीएमसीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सुमारे १४ टीएमसी पाणी सोडणार आहे. .नदीद्वारे : पहिल्या आवर्तनात नदीद्वारे ७ टीएमसी पाणी सोडण्यात आले असून, दुसऱ्या आवर्तनातून ६ टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. तसेच २५ एप्रिलपासून नदीमार्गे १२ दिवसांचे आणखी एक आवर्तन सुरू होणार आहे. त्यातून सुमारे ६ टीएमसी पाण्याचा वापर होणे अपेक्षित आहे.
अरण येथील श्री संत सावता महाराज संजीवन समाधी स्मारकासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया खरेदी प्रक्रियेने राबवावी. यातील अडथळे दूर करावेत. दि. २४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. या स्मारकासाठी शासनाने १५० कोटी रुपये मंजूर केले. त्यापैकी ८९ कोटींना मान्यता मिळाली आहे. त्याचबरोबर मंगळवेढा येथे होणाऱ्या महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकासाठी चोखामेळा नगरातील जागा देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आला आहे. या दोन्ही स्मारकांचे काम गतीने पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. या वेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदी उपस्थित होते. मंगळवेढ्यातील चोखामेळानगर हद्दीतील कृष्ण तलावाशेजारील जागा श्री जगद््ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी देण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आला आहे. यातील किमान १५ एकर जागा स्मारकासाठी उपलब्ध करून द्यावी. तसेच कृष्ण तलावाच्या सुशोभीकरणाचाही प्रस्ताव आराखड्यात घ्यावा, असा आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला. तसेच या स्मारकाचा आराखडा करण्यासाठी वास्तुविशारद यांची नियुक्ती करण्याची सूचना पालकमंत्री गोरे यांनी दिली.
पंढरपूर शहरातील प्रमुख क्रीडांगणे सध्या खेळाडूंऐवजी वाहनांच्या पार्किंगसाठी वापरली जात असून, प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे क्रीडाप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी नगर अभियंता केसकर यांना बॅट आणि बॉल भेट देऊन 'गांधीगिरी' पद्धतीने आंदोलन केले. तसेच, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे ही मैदाने तातडीने रिकामी करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. पंढरपूर शहरातील खेळाडूंच्या हक्काची असलेली प्रमुख मैदाने सध्या पार्किंगच्या विळख्यात अडकली आहेत. यामध्ये गोपाळपूर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण (गौतम विद्यालय जवळ), सोलापूर रोडवरील प्रसिद्ध अंबाबाई पटांगण, शहराच्या मध्यवर्ती भागातील टिळक स्मारक मैदान, या मैदानांवर वाहनांचा गराडा असल्याने खेळाडूंना सराव करणे अशक्य झाले आहे. प्रशासनाच्या धोरणामुळे पंढरीतील क्रीडांगणे जणू शेवटचा श्वास घेत आहेत,अशी भावना विक्रम शिरसट यांनी यावेळी व्यक्त केली. उन्हाळी सुटी जवळ आली असून, शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी मैदाने खुली असणे आवश्यक आहे. केवळ मुलेच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि फिरण्यासाठी ही मैदाने महत्त्वाचे साधन आहेत. शहरातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडावेत, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या मैदानांचा वापर केवळ पार्किंगसाठी होणे ही क्रीडा क्षेत्राची मोठी हानी असल्याचे शिरसट यांनी नमूद केले. निवेदन देतेवेळी सागर तारापूरकर, विजय अभंगराव, दीपक येळे, संपत सर्जे, आकाश पांढरे, सुशील नेहत्तराव, मयूर अभंगराव, प्रशांत शिरसट, सागर पांढरे यांच्यासह मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी आणि नागरिक उपस्थित होते. वाहनतळ अतिक्रमणाच्या विळख्यात पंढरपूर शहरातील बहुतांश वाहन तळ हे अतिक्रमणाच्या विळख्यात असून खेळाची मैदाने मात्र वाहनांसाठी पार्किंग स्पॉट बनलेली आहेत. शहरात मोक्याच्या जागी वाहनतळ आहेत, मात्र या वाहनतळाला अतिक्रमणाचा विळखा आहे. काही ठिकाणी व्यवसायिक तर काही ठिकाणी सामाजिक दबाव टाकून हे वाहन तळ अक्षरशः गिळंकृत केलेले आहेत. पालिकेने या तळावर कंपाऊंड केलेले असले तरी आतमध्ये झालेली अतिक्रमणे तशीच ठेवलेली आहेत.
सत्तेची मुजोरी आणि वापर करून चुकीच्या प्रवृत्ती आज फोफावत आहेत. त्या प्रवृत्तीला विरोध करणे काळाची गरज आहे. यासाठी हा निर्णय घ्यावा लागतोय. तुम्ही सहमत असाल तरच निर्णय घेतला जाईल. स्वर्गीय भारत नानांचं रक्त अंगात आहे, लढायचा आहे, अर्ध्या वाटेतून कधीच पळून गेलो नाही. निवडणुकीपासून कधीच पळ काढला नाही, पदाधिकाऱ्यांची चर्चा करून निर्णय घेण्याअगोदर काही लोकांनी वावड्या उठवल्या आहेत, तुम्ही अजिबात काळजी करू नका २०२९ ला कसं लढायचं अन् जागा खेचून कशी आणायची? ते आम्ही बघतो, असा विश्वास विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी व्यक्त केले. ते जोगेश्वरी मंगल कार्यालयात सोमवारी दुपारी कार्यकर्त्यांच्या विचार विनिमय बैठकीत बोलत होते. या वेळी भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत दामाजी कारखान्याचे व्हाइस चेअरमन तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, माजी सभापती संभाजी गावकरे ,मुरलीधर सरकळे, माजी सरपंच अशोक पवार, दौलतराव माने, सुरेश कोळेकर, आप्पासाहेब माने उपस्थित होते. भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत म्हणाले, सध्या तालुक्यात काम करत असताना कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन, तहसील दोघं आठवड्यातून तर एकत्र या काँग्रेस कमिटीचे मतदारसंघ अध्यक्ष मारुती वाकडे म्हणाले, हे समोर बसलेले सगळे व हे पदाधिकारी एकत्र राहणार का? एकनाथ शिंदे सत्ताधारी माणूस आहे, तुम्ही सत्तेत चाललाय चांगली गोष्ट आहे. परंतु दोघं आठवड्यातून एकत्र या, आपल्यात दहा मिनिटाला विचार बदलतात. दुपारी चार वाजता काँग्रेसची मीटिंग आहे. तिथे मला जावं लागतंय. प्रत्येक जण कुठेतरी गुतलेला आहे, असे म्हणताच पिकला. कार्यालयात कोणत्या पक्षाच्या आहात अशी विचारणा केली जाते. त्याला न्याय दिला जात नाही ही लोकशाही नाही. आम्ही दोघांनी विधानसभेला वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवली. आम्ही दोघे एकत्र असतो तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. राजकारणात झालेल्या चुका भरून येत नसतात. पुढच्या काळात दोघे अशा चुका करणार नाही. एका विचाराने काम करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या वेळी नगरसेवक सोमनाथ माळी, सिद्धेश्वर धसाडे, मारुती पेट्रगे ,सागर गुरव , कृष्णदेव लोंढे,अभिजीत मोरे, माणिक पवार यांनी विचार व्यक्त केले. आता ग्रामपंचायतीच्या निधीमध्येही अडवणूक होतेय भारत नाना भालके आमदार असताना तालुक्यातील मंगळवेढा तालुक्यातील ८० ग्रामपंचायती संपूर्णतः त्यांच्या विचाराच्या नव्हत्या, विरोधातल्या ग्रामपंचायत म्हणून कधीही अडवणूक केली नाही. आज मात्र विरोधातली ग्रामपंचायत म्हणून निधी अडवायचे, त्या सरपंचांनी आपल्या गटात प्रवेश करत नाही तोपर्यंत निधी मिळणार नाही, आता चुकीची प्रवृत्ती आणि परंपरा सुरू झाली असून, या ठिकाणी उपस्थित असलेले सरपंच राजू गाढवे यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे भगीरथ भालके यांनी सांगितले.
माढा शासनाने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचावा. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत. यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू. योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्रांसह पंचायत समितीकडे मागणी करण्याबरोबरच शासनाच्या सर्व योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनापासून प्रयत्न करावेत, असे आवाहन माढा तालुका पंचायत समितीचे सभापती पंडित देशमुख यांनी केले. ते भारतीय जनता पक्षाच्या स्थापन दिनानिमित्त उपळाई खुर्द येथे भाजप किसान मोर्चा सोलापूर पश्चिम यांच्या वतीने आयोजित प्रगतिशील शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. या वेळी शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५ शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. भाजप किसान मोर्चा सोलापूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कुलकर्णी यांच्या वतीने भाजप स्थापना दिनानिमित्त उपळाई खुर्द येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रास्ताविक करताना प्रकाश कुलकर्णी म्हणाले की,भाजप हा केवळ पक्ष नसून, देशहिताची चळवळ आहे. पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करणे ही प्रेरणादायी गोष्ट असून, अशा शेतकऱ्यांमुळेच कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळते. या वेळी प्रा. शिवाजीराव सावंत, शेतीतज्ञ मनोज शहा यांच्यासह शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रगतशील शेतकऱ्यांचा झाला पुरस्काराने सन्मान औदुंबर कोल्हे, मनमत गोटे, मंगेश देशमुख, विष्णू घाडगे, प्रकाश जाधव, विक्रम डोईफोडे, लक्ष्मण देशमुख, सुशेन ताटे, प्रशांत क्षीरसागर, संगीता सातपुते, रंजना शिंदे यांच्यासह एकूण २५ शेतकऱ्यांचा शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य किसान मोर्चा उपाध्यक्ष शशिकांत देशमुख, माढा तालुकाध्यक्ष योगेश पाटील, वडशिंगचे सरपंच दत्तात्रय जाधव,माजी नगरसेवक अरविंद खरात, नंदकुमार मोरे, सतीश पाटील यांच्यासह सुमारे ३०० शेतकरी व महिला उपस्थित होते.
घरचे अठराविश्व दारिद्र्य... आई-वडील शेतमजुरी करतात... एक गुंठाही शेती नाही... अशा स्थितीत आई-वडिलांचे कष्ट पाहून जिद्दीने पहिल्याच प्रयत्नात सागर सुतकर पोलिस भरती झाला. बार्शी तालुक्यातील मळेगाव गावातील सागर बाळासाहेब सुतकर या तरुणाने उस्मानाबाद शहर पोलिस भरतीत यश संपादन केले. मागील दोन वर्षांपासून सातत्याने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या सागरने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. सागरचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मळेगाव, माध्यमिक शिक्षण मित्र विद्यालय मळेगाव येते तर पदवीपर्यंतचे शिक्षण हे बी. पी. सुलाखे कॉलेज बार्शी या ठिकाणी झाले आहे. शिक्षणासोबतच पोलिस भरतीसाठी आवश्यक असलेल्या शारीरिक चाचण्यांची तयारी, नियमित सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने हे यश मिळवले. परिस्थितीवर मात करत त्याच्या जिद्दीमुळे आणि कठोर परिश्रमांमुळे आज तो परिस्थितीने मागे असलेल्या तरुणांसाठी प्रेरणास्थान बनला आहे. अतिशय गरीब कुटूंबातून आलेल्या सागरला पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव, शौर्य क्लासेसचे अजित कोळी, विशाल कोलगे यांनी दोन वर्षात कोणत्याही प्रकराची फी न घेता मदत केली. व मित्रपरिवाराचे मार्गदर्शन लाभले. मित्रांनी काढली गावातून वाजत-गाजत मिरवणूक हलाखीच्या परिस्थितीवर मात करत शेतमजूर दाम्पत्याच्या मुलाने मिळवलेले यश पाहून गावातील मित्रपरिवार व ग्रामस्थांनी सवाद्य मिरवणूक काढली. मळेगावमधील विश्वभूषण प्रतिष्ठानच् मळेगाव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मित्र परिवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शिक्षक म्हणजे गुणवत्तेची खाण असल्याने पालक निरागस चिमुकल्याला शिक्षकांकडे मोठ्या विश्वासाने पाठवत असतात. शिक्षकांनी उपलब्ध असलेल्या साधनांनी या विद्यार्थ्यांतील उपजत गुणांना आकार देऊन एक आदर्श भावी पिढ्या घडवाव्यात, असे प्रतिपादन माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी केले. माळशिरस तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने येथील स्मृती भवनमध्ये आदर्श पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. या वेळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील ३९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यात एक शिक्षण विस्ताराधिकारी, ७ मुख्याध्यापक व ३१ सहशिक्षक असे एकूण ३९ जणांना तालुकास्तरीय आदर्श पुरस्कार आमदार उत्तम जानकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी सभापती दत्ता मगर, उपसभापती मनीषा पाटील, जिल्हा परिषद सदस्य गौतम माने, नागन्नाथ भोसले, सुषमा नारनवर, मीनाक्षी सरतापे, लीलावती ठवरे, पंचायत समिती सदस्य प्रवीण वाघमोडे, युवराज झंजे, आनंद शेंडगे, महादेव साबळे, अप्पासाहेब पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी यांनी माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३९१ शाळा असून त्यामध्ये २८०६५ विद्यार्थी शिक्षण घेतात. तर १११७ शिक्षक विद्यादानाचे काम करत असल्याचे सांगितले. या वेळी आदर्श शिक्षकांच्या वतीने किरण घाडगे, अर्जुन पिसे यांनी मनोगत व्यक्त केले. सुहास उरवणे,राजाराम गुजर, नितीन बनकर यांनी सूत्रसंचालन केले, तर गटविस्तार अधिकारी असलम इनामदार यांनी आभार मानले. या शिक्षकांचा झाला सन्मान विस्तार आधिकारी अस्लम इनामदार, केंद्रप्रमुख सिद्धेश्वर भरते, मुख्याध्यापक,भारत मगर, संभाजी फुले, बाळू शिंदे, युन्नूस तांबोळी, दत्तात्रय पराडे, मधुकर वनसाळे, सहशिक्षक शीतल जाधव, सुरेश शिंदे, दिलीप उकिरडे, भारतीय गवळी, सुरेखा काळे, राजश्री जाधव, रमेश सरक, अर्जुन पिसे, आनंद गोंदलवाड, पद्मिनी मारकड, लक्ष्मण भिंगे, अंकुश कोळी, अर्चना कामेगावकर, सुहास उरवणे, धनाजी जाधव, विष्णू जायभाय, दीपाली तापोळे, प्रभाकर कटकदोंड, विजय हेगडे, अयुब काझी, नागनाथ वाघमोडे, वर्षाराणी हेगडे, संगीता पोरे, रुक्मिणी पारसे, जहाँगीर मुलाणी, दत्तात्रय चव्हाण, अमोल सोपनर, नवनाथ क्षीरसागर, किरण गाडगे, संतोष चौगुले, विनोद चंदनशिवे.
राहुरी विधानसभा निवडणुकीत अक्षय कर्डिले विरुद्ध माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अशी लढत होऊ शकते, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, सोमवारी सर्व अंदाज फोल ठरवत, तनपुरेंनी माघार घेतली. या प्रक्रियेत राज्याचे पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची शिष्टाई यशस्वी ठरली. रिंगणातील सध्याचे चित्र पाहता ही निवडणूक बहुरंगी होणार असल्याची चिन्ह आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचा अपक्ष तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटेंनी अर्ज दाखल केला. वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळकेही रिंगणात उतरले आहेत. तर काँग्रेसकडूनही अर्ज दाखल झाले आहेत. राहुरीचे दिवंगत आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा गेल्या दिवसांपासून झडत होती. पण, माजी मंत्री तनपुरे अपक्ष रिंगणात उतरणार असल्याचा सूर अळवला जात होता. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम नाट्यमय घडामोडी घडल्या. सकाळीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी तनपुरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर तनपुरेंनी निवडणुकीतून माघार घेऊन अर्ज दाखल केला नाही. सद्य:स्थितीत निवडणूक रिंगणात ३० उमेदवार आहेत. या उर्वरित पान ४ डॉ.राधाकृष्ण विखे, पालकमंत्री : विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे आमचे धोरण आहे. आम्ही प्राजक्त तनपुरे यांच्या मागणीबाबत सकारात्मक आहोत. मुळा धरणातील गाळ काढण्याला आधीच मान्यता दिली. केके रेंजविषयी शेतकऱ्यांच्या बाजुने भूमिका मांडू. रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, भाजप : प्राजक्त तनपुरे व आम्ही एकत्र काम केले, ते मंत्री म्हणूनही काम करत होते. त्यांनी मांडलेले विषय एकत्रीतपणे सोडवता येतील अशी विनंती केली. विधान परिषदेबाबतचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाचा असून, त्याचा प्रमूख मीच आहे. प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री : मी राहुरीतील प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढवणार होतो. परंतु, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांनी माझी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक न लढवण्याची विनंती केली. विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. स्व. कर्डिले यांना आदरांजली अर्पण करून पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या रिंगणाात आता ३० उमेदवार अक्षय कर्डिले (भाजप), पोटनिवडणुकीसाठी रावसाहेब खेवरे (शिवसेना, ठाकरे), संतोष चोळके व सोमा जाधव (वंचित बहूजन आघाडी), गोविंद मोकाटे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार), सूर्यभान लांबे, अथर्व म्हसे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, अपक्ष), सुदर्शन शितोळे (हिंदू एकता आंदोलन)
उन्हाळ्याची तीव्रता वाढताच शहरातील बाजारपेठेत लिंबाचे दर गगनाला भिडले आहेत. अवघ्या महिनाभरापूर्वी ग्राहकांना ३० रुपये प्रति किलो दराने मिळणारे लिंबू आता थेट १४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. किरकोळ बाजारात एक लिंबू ५ ते १० रुपयांना मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात वाढलेल्या दरांचा थेट फटका घरगुती वापरासह हॉटेल व्यावसायिकांनाही बसत आहे. कडक उन्हाळ्यात पाण्याची मागणी आणि शरीराची तहान भागवण्यासाठी लिंबू सरबताचा वापर वाढतो. मात्र, आवक घटल्याने आणि वाढत्या मागणीमुळे लिंबाचे भाव वधारले आहेत. अहिल्यानगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, नालेगाव परिसरात मोठा बाजार भरतो. मुख्य बाजारपेठेत चितळे रोडवरील भाजीपाला बाजार, तर सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, एकविरा चौकाजवळील भाजीबाजार, गणेश चौक, बालिकाश्रम रोड, तपोवन रोड, आदी ठिकाणी लिंबाची विक्री होते.लिंबासह इतर भाजीपाल्याच्या बाजारभावातही चढउतार दिसत आहेत. यंदाच्या ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने भाजीपाल्याच्या बाजारभावावर परिणाम जाणवत आहेत. अवकाळीच्या फटक्यामुळे मागील महिन्याच्या तुलनेत मेथीची जुडी ५ रुपयांनी, कोबी व फ्लॉवर प्रतिकिलो १० रुपयांनी, कांदा व बटाटा ५ रुपयांनी महागले आहेत. तर पालक व कोथिंबीर जुडी, काकडी, वांगी व टोमॅटोचे दर मात्र स्थिर आहेत. सध्याचे बाजारभाव (किलोमध्ये) पालक जुडी : १५ रु., मेथी जुडी २० रु. कोथिंबीर जुडी : १५ रु, कोबी : ४० रु, फ्लॉवर : ७० रु, काकडी : ४० रु, कांदा : २५ रु, बटाटा : २५ रु, वांगी : ३० रु, कारले : ४० रु, शेवगा : ७० रु, गावरान लसूण : १०० रु, हायब्रीड लसूण : ८० रु, लिंबू : १४० रु, टोमॅटो : ३० रु. गेल्या महिन्याच्या तुलनेत शेवगा आणि लसणाच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्यात २०० रुपये प्रतिकिलो असलेला शेवगा आता ७० रुपयांवर आला आहे. तसेच, गावरान लसूण २५० वरून १०० रुपयांवर, तर हायब्रीड लसूण १६० वरून ८० रुपयांपर्यंत खाली आला आहे. उत्पादनात वाढ झाल्याने हे दर निम्म्याहून अधिक कमी झाले आहेत.
प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र आयोजित १४ वे मराठी साहित्य संमेलन नागपूर येथे उत्साहात पार पडले. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कवी श्यामसुंदर गावकर उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थापिका देगलूरकर, प्रमुख अतिथी अंजली डोळे, उद्घाटक राज यावलीकर उपस्थित होते. साहित्य संमेलनप्रसंगी बोलताना संस्थापिका लीना देगलूरकर म्हणाल्या, 'समाजामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या प्रांतांमध्ये, वेगवेगळे कार्य अविरतपणे निष्कामपणे करत असतात. त्यांचे हे कार्य, समाजभान दिशादर्शक असते. अशा साहित्यिकांची, मान्यवरांची मांदियाळी आज संमेलननिमित्ताने पाहताना अभिमान वाटतो. इंटरनेट, मोबाइलचा अतिवापर टाळत, वाचन संस्कृतीला घराघरातून सर्वांनी प्राधान्य द्यायला हवे असे त्यांनी सांगितले. या साहित्य संमेलनामध्ये अहिल्यानगर येथील कवी लेखक बाळासाहेब देशमुख यांनी शिकवण ही रचना सादर केली. ग्रामीण भागातील आईवडील आपल्या मुलांना संगोपन करताना संस्कार, संस्कृतीचे बाळकडू कसे दिले जाते यावर त्यांनी भाष्य केले. या संमेलनामध्ये ज्येष्ठ कवयित्री अंजली डोळे, कवी दीपक करगुंटकर या मान्यवरांच्या हस्ते बाळासाहेब देशमुख यांना सन्मानित करण्यात आले. बाळासाहेब देशमुख यांचे रंग माझा वेगळा, माणसे अशी.. अन् तशीही.., माणसे.. भिंगातून इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.
वरखेडची श्री लक्ष्मी देवीची आज यात्रा:16 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची राहणार नजर'
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील वरखेड येथील श्री लक्ष्मी देवीची यात्रा मंगळवारी (७ एप्रिल) भरत आहे. यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांच्या स्वागतासाठी वरखेडनगरी सज्ज झाली आहे. यंदा सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला असून, मंदिर परिसरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष कडू पाटील गोरे यांनी दिली. यात्रेनिमित्त सोमवारी रोजी रात्री ८.३० वाजता 'होम' विधी झाला. मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस असेल. या दिवशी पालखी सोहळा, छबीना आणि प्रेक्षणीय शोभेच्या दारुकामाची (आतषबाजी) मोठी मेजवानी भाविकांना पाहायला मिळणार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता पैठण येथून कहार व भोई समाजाने आणलेल्या पालखीची पूजा ट्रस्टी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी परिसरातील विविध एसटी डेपोतून जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी यात्रेसाठी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, निवारा आणि दुकानांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्री लक्ष्मी देवी ट्रस्टचे अध्यक्ष कडूपाटील गोरे, उपाध्यक्ष लक्षाधिश दाणे, सचिव राजू शिरसाठ, खजिनदार रावसाहेब कुंढारे व सर्व विश्वस्त मंडळाने भाविकांना दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
नाशिक येथील 'रॉयल रायडर्स' आयोजित महाकुंभ व्हर्च्युअल सायकलिंग चॅलेंजमध्ये शेवगाव सायकल असोसिएशनच्या दोन संघांनी यश संपादन केले. यात शेवगावच्या 'डेक्कन वॉरियर' संघाने ३१ दिवसांत तब्बल १० हजार ८४६ किमीचा टप्पा पार करून देशपातळीवर द्वितीय क्रमांक पटकावला, तर 'शेवगाव रायडर' संघाने ५३ व्या क्रमांकावर झेप घेतली. या देशव्यापी चॅलेंजमध्ये एकूण ९७ संघांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक संघात चार रायडर्सना ३१ दिवसांत किमान २४२४ किमी अंतर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, शेवगावच्या सायकलपटूंनी हे उद्दिष्ट पार करत विक्रमी किमीची नोंद केली. डेक्कन वॉरियर (द्वितीय क्रमांक): सचिन वांढेकर, विठ्ठल आर्ले, राहुल सुर्वे आणि संजय शिवरामवर. या संघाने १०,८४६ किमी अंतर कापले.शेवगाव रायडर (५३ वा क्रमांक): नीलकंठ लबडे, वसंत सुरवसे, डॉ. दीपक वैद्य आणि डॉ. मनिषा लड्डा. या संघाने २,७८७ किमी अंतर पूर्ण केले. ५ एप्रिल रोजी नाशिकच्या डीकॅथलॉन येथे पार पडलेल्या सोहळ्यात यशस्वी खेळाडूंचा मेडल देऊन गौरव करण्यात आला. नाशिकच्या महापौर सौ. हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नाशिक सायक्लिस्ट फाऊंडेशनचे माजी अध्यक्ष प्रवीण खाबिया, रॉयल रायडर्सचे अध्यक्ष डॉ. आबा पाटील आदि उपस्थित होते. शेवगावच्या सायकलपटूंनी मिळविलेल्या या यशाबद्दल शेवगाव सायकल असोसिएशनचे पदाधिकारी विनोद ठाणगे, डॉ. मुकुंद दारकुंडे, डॉ. संदीप बोडखे, कैलास जाधव, डॉ. प्रदीप उगले, डॉ. जगदीश कुलकर्णी, निलेश केवळ, सुनील गवळी व प्रदीप बोडके यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
महावितरणच्या सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या वीज जोडण्या त्वरित द्याव्यात,सिंगल फेज योजनेची मंजूर कामे तातडीने पूर्ण करावीत, भारनियमनाचा कालावधी कमी करून पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांनी आज, सोमवारी (६ एप्रिल) महावितरणच्या टाकळी ढोकेश्वर येथील वीज उपकेंद्रास टाळे ठोकून ठिय्या आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या निष्क्रियेच्या निषेधार्थ त्यांना बांगड्यांचा आहेर करण्यात आला. दरम्यान, विविध प्रलंबित प्रश्न येत्या दोन दिवसांपासून ते आठ दिवसांच्या कालावधीत मार्गी लावण्याचे आश्वासन महावितरणचे उप कार्यकारी अभियंता गांगुर्डे यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेले ठिय्या आंदोलन,पाच तासांनी,दुपारी साडेतीन वाजता संपले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आर.आर.राजदेव, म्हसोबा झाप ग्रामपंचायतीचे प्रशासक प्रकाश गाजरे,अमोल उगले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील आदिवासी बहुल गावांमध्ये विजेच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून असंतोष धुमसत होता.या असंतोषाचा आज उद्रेक झाला. खासदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून आरडीएसएस योजनेअंतर्गत मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांची उदासीनता आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांना अद्यापही अधिकृत वीज जोडणी मिळाली नाही. हक्काच्या विजेसाठी शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही केवळ पोकळ आश्वासने मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आज सुटला असल्याचे आर. आर. राजदेव म्हणाले. महावितरणने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. लावावीत.अश्वासनाप्रम ाणे कालबध्द पध्दतीने कामे पूर्ण करावीत.अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रकाश गाजरे यांनी दिला. अभिजीत झावरे,पांडुरंग आहेर, खंडू भाईक, कैलास सैद, प्रवीण सैद, अनिल आहेर, झांबर दरेकर, बाळासाहेब आहेर, संपत वाळुंज, विठ्ठल रोहकले, अशोक वाळुंज, शुभम काळे, दात्तराय वाळुंज, राजेंद्र दुधवडे, साहेबराव दुधवडे, संदीप गुंजाळ, काळूराम दुधवडे, लक्ष्मण कारंडे, गिरजु सूळ, लहू वाळुंज, ऋषिकेश वाळुंज, संजय पारधी, लहू भुतांबरे, विष्णू वाळुंज, बाबासाहेब वाळुंज, साहिल वाळुंज, भागचंद वाळुंज यांसह म्हसोबा झाप, वारणवाडी, कामटवाडी, वासुंदे, नांदूर पठार, सावरगाव, पळसपुर, काटाळवेढा, काकणेवाडी, खडकवाडी, पळशी या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भाजपाचा 46 वा स्थापना दिन लोणीत उत्साहात:कार्यकर्त्यांनी गावपातळीवर जनाधार वाढवावा- मंत्री विखे
भाजपा हा केवळ राजकीय पक्ष नसून, तो एक विचार आहे. अंत्योदय चळवळ ते विकसित भारत असा पक्षाच्या वाटचालीचा यशस्वी प्रवास जनतेच्या दृढ विश्वासाने सुरू आहे. भविष्यात पक्षाचा जनाधार अधिक भक्कम होण्यासाठी कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर पक्षाचा विचार पोहचविण्यासाठी काम करावे, अशी अपेक्षा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाच्या ४६व्या स्थापना दिवसानिमित्त लोणी येथील जनसंपर्क कार्यालयात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्यासह प्रवरा बॅकेंचे चेअरमन डॉ.भास्करराव खर्डे, जेष्ठ नेते किसनराव विखे, चेअरमन नंदकिशोर राठी, चेअरमन मकरंद गुणे, व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, सोपानराव शिरसाठ, विजयराव लगड, बाजार समितीचे संचालक राहुल धावणे, सरपंच कल्पना मैड, सुनिल जाधव, जिल्हा भाजपाच्या सौ.शोभा घोरपडे, अनिल विखे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, एन.डी विखे, रविंद्र धावणे, अशोक धावणे, संजय आहेर, सोपान विखे, चांगदेव विखे, दिलीप विखे यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख निर्माण झाली आहे. यामागे समर्पित भावनेन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन आहे.
पाथर्डीत चूल पेटवून सरकारचा निषेध:गॅस टंचाईवरून वंचित' आक्रमक
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे निर्माण झालेली गॅस टंचाई आणि सिलिंडरच्या कमतरतेविरोधात वंचित बहुजन आघाडीने सोमवारी (६ एप्रिल) पाथर्डी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. नरेंदर कब मिलेगा गॅस सिलेंडर अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी चूल पेटवून आणि रिकाम्या सिलिंडरचे प्रतिकात्मक प्रदर्शन करत सरकारचा निषेध नोंदवला. आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नायब तहसीलदार किशोर सानप यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात गॅस टंचाई दूर करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी युवक तालुकाध्यक्ष आकाश शिंदे, महिला अध्यक्षा रोहिणी ठोंबे, लहू शिंदे, मार्कस शिंदे, सुभाष शिंदे, आजिनाथ साळवे, विजय साळवे, अमोल जाधव, बाळासाहेब पंडागळे, दादू वाघमारे, तानाजी वाघमारे, कैलास वाघमारे, सचिन वाघमारे, गहिनीनाथ नाकाडे, दत्तात्रय सातपुते आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तालुकाध्यक्ष श्रीकांत बोर्डे म्हणाले,वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन हाती घेण्यात आले असून, त्याचा एक भाग म्हणून आज हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.शासनाने गॅस पुरवठ्यातील कमतरता दूर करून नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल.
अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान:तातडीच्या मदतीची केली मागणी
तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आधीच तोट्यात चाललेल्या या व्यवसायाला आणखी मोठा फटका बसला आहे. यामुळे संतप्त वीट उत्पादकांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. विट भट्टी व्यवसायासाठी लागणाऱ्या माती, राख, कोळसा व भुसा यांच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने व्यावसायिक आधीच आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यातच अचानक झालेल्या पावसामुळे तयार विटा व कच्चा माल पूर्णपणे भिजून मोठे नुकसान झाले आहे. वीट उत्पादक संघाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देशातील हा एकमेव व्यवसाय असून त्यासाठी कोणतीही विमा योजना उपलब्ध नाही. याबाबत अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असला तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीप्रमाणे विट भट्टी व्यवसायिकांसाठीही स्वतंत्र धोरण आखून विमा योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, विमा कंपन्या हा विषय शासनाचा असल्याचे सांगत असून शासन व विमा कंपन्या एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. दरवर्षी शासनाकडे मातीची रॉयल्टी व इतर कर नियमित भरूनही, नुकसान झाल्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे. तरी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी तसेच विट व्यवसायासाठी विमा योजना लागू करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी वीट उत्पादक संघाचे अध्यक्ष कैलास वाकचौरे यांच्यासह राजू जोर्वेकर, मच्छिंद्र जोर्वेकर, संतोष जोर्वेकर, बाळासाहेब जोर्वेकर, अनिल जोर्वेकर, दिगंबर जोर्वेकर व विशाल सोनवणे यांनी केली आहे.
बागलाण तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळबागा आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी नुकसानग्रस्त गावांना भेट देत पाहणी केली. आगामी तीन दिवसीय विशेष अधिवेशनात या नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर करून केंद्र सरकारकडे नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात सलग चार दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गिरणा, आरम व मोसम पट्ट्यातील फळबागा आणि शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून, जनावरांच्या चाऱ्याचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. खासदार डॉ. बच्छाव यांनी रविवारी सटाणा, चौगाव, भाक्षी, मुळाणे, कौतिकपाडे, सारदे, मोराणे-सांडस, आसखेडा, सोमपूर, तांदुळवाडी, दरेगाव, नांदीन व ताहाराबाद आदी गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानीची माहिती प्रत्यक्ष जाणून घेतली. विशेष अधिवेशनात बागलाण तालुक्यातील नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर करून केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते दिनेश बच्छाव, प्रकाश देवरे, यशवंत आहिरे, माजी सरपंच चेतन वनीस, श्रीकांत रौंदळ, आबा रौंदळ, योगेंद्र दात्रे, बाळासाहेब भदाणे, किशोर कदम व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येथील श्रीनाथ हायस्कूलमध्ये ‘रंग उधळूया वाचनाचे’ या संकल्पनेतून बालवाचक मेळावा व गौरव सोहळा उत्साहात झाला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरील साहित्याशी ओळख व्हावी, या उद्देशाने उपक्रम राबवला. इयत्ता सहावी ते नववीतील विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील विविध साहित्यकृती वाचल्या. त्यावर आधारित रसग्रहण केले. चर्चासत्र सादर केले. ययाती, पावनखिंड, एक भाकर तीन चुली, श्यामची आई, एक होता कार्व्हर, मृत्युंजय ही पुस्तके वाचली. छत्रपती शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रांचेही वाचन केले. उपक्रमाची संकल्पना श्रीकांत बांदल यांनी मांडली. मागील वर्षापासून उपक्रम सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पुस्तकांतील पात्रे, कथा, नीतिमूल्ये यांचे सादरीकरण केले. पायल शेळके, स्नेहा शेळके, आयशा पठाण, विहाण डोंगरे, सोहम राख, अंकिता गरड, कार्तिकी जाधव, गौरी तुपे, रेवती वडेकर, श्रावणी भावले, साक्षी इरतकर, श्रुती लबडे, हर्षदा जाधव, अक्षरा भोसले, आरती आहेर आदींचा सहभाग होता. प्राथमिक मुख्याध्यापक संतोष खराद उपस्थित होते. हायस्कूल विभाग प्रमुख सिकंदर थोरात उपस्थित होते. मिडल विभाग प्रमुख अनिल काकडे उपस्थित होते. सुनिल चितळे उपस्थित होते. सर्व बालवाचक विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन गौरवी लांडगे, अक्सा शेख, अंकिता गरड, कार्तिकी जाधव यांनी केले. प्रास्ताविक समृद्धी बडे हिने केले. मोबाइलपासून दूर राहा, वाचनाची सवय लावा ः अध्यक्षस्थानी प्राचार्य शिवाजीराव पठाडे होते. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते, असे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे प्रा. संतोष गव्हाणे यांनी वाचन संस्कृतीमुळे संस्कार, नीतिमूल्यांची जडणघडण होते, असे सांगितले. सशक्त नागरिक तयार होतात, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहावे. वाचनाची सवय लावावी, असे आवाहन त्यांनी केले.
‘वंचित’ने पैठण तहसीलपुढेच चूल पेटवून नोंदवला गॅस टंचाईचा निषेध
राज्यभर सुरू असलेल्या घरगुती गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीने पैठण तहसील कार्यालयावर आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी चुलीवर चहा तयार करून निषेध नोंदवला. गॅसच्या तुटवड्यामुळे स्वयंपाकघरातील शेगड्या थंड पडल्या आहेत. चहाच्या टपऱ्या, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, छोटे व्यावसायिक यांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेकांना लाकूड, कोळशाच्या चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये हॉटेलमध्ये चहा, नाश्ता, इडली-डोसा, तळले जाणारे पदार्थांची विक्री बंद पडली आहे. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, केटरिंग व्यवसायावरही गॅस टंचाईचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक कार्यक्रम पुढे ढकलले गेले आहेत. शिक्षणासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांना मेसमध्ये गॅस उपलब्ध नसल्याने जेवणाची सोय बंद झाली आहे. अनेक विद्यार्थी गावाकडे परत गेले आहेत, असे तहसीलदार पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले.
लासूर स्टेशन लासूरगाव (ता. वैजापूर) येथील मराठवाड्याचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या कुलस्वामिनी श्री देवी दाक्षायणी माता मंदिराच्या इतिहासात प्रथमच रविवारी सायंकाळी दर्शन रांगेतील पैठण तालुक्यातील एका भाविक दांपत्याला थेट मातेला वस्त्रालंकार परिधान करण्याच्या पूजेचा मान मिळाला. दीड ते दोन तास पाच ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात धार्मिक विधी झाले. गेल्या तीन वर्षांपासून वैजापूरचे तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष सुनील सावंत यांनी मंदिराचा पदभार स्वीकारला. त्यांच्या संकल्पनेतून जुनी पद्धत बंद झाली. थेट दर्शन रांगेत समोर असलेल्या सर्वसामान्य भाविकांच्या जोडप्यांनाच आरतीचा मान देण्याची पद्धत सुरू झाली. भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले. लासूरगाव येथील शिवना नदीकाठी वसलेल्या श्री देवी दाक्षायणी मातेची यात्रा मंगळवारपासून (दि. ७) सुरू होत आहे. यात्रा १५ दिवस चालणार आहे. देशभरातून १० लाखांपर्यंत भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज मंदिर प्रशासनाकडून व्यवस्थापक विष्णू हरिचंद्रे यांनी व्यक्त केला. रविवारी सायंकाळी मातेस १ किलो सोन्याचे दागिने, वेगवेगळी वस्त्रे, १५ किलो चांदीचा टोप घालण्यात आला. नऊवारी आकर्षक साडीचोळी परिधान करण्यात आली. देवीची ओटी भरली. लोकाक्ष गुरु संतोष जोशी, श्रीकांत जोशी यांच्या मंत्रघोषात वस्त्रालंकार पूजा झाली. या पूजेचा मान मंदिराच्या इतिहासात प्रथमच दर्शन रांगेतील नकुल नाचन, सुवर्णा नाचन पारुंडी (ता. पैठण) यांना देण्यात आला. त्यांनी व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे, पत्नी वैशाली विष्णू हरिश्चंद्रे यांच्या समवेत विधिवत पूजा करून दाक्षायणी माता प्रसन्न झाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी सहव्यवस्थापक संतोष शेलार, पोलिस अंमलदार किरण गोरे, आदिनाथ वाघुडे उपस्थित होते. मोठ्या संख्येने भाविकही होते. देवी दाक्षायणी मातेच्या अंगावर कोट्यवधी रुपयांचे दागिने आहेत. यात्रा काळात १५ दिवस मंदिराच्या चहूबाजूने वैजापूर पोलिसांचा शस्त्रधारी पहारा आहे. यंदाही मोठा पोलिस बंदोबस्त लावला आहे, अशी माहिती वैजापूरचे पीआय सत्यजित ताईतवाले यांनी दिली.
तालुक्यातील शेतीला जोडणाऱ्या पाणंद रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढले जातील. नवीन रस्त्यांची उभारणीला प्राधान्य दिले जाईल. कुठेही रस्ते अडवून काम थांबले असेल तर ते सुरू करावे. याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा आमदार विलास भुमरे यांनी दिला. पाणंद रस्ते मार्गी लावण्यासाठी स्थानिक सरपंच, ग्रामसेवकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत तालुकास्तरीय आढावा बैठक आमदार विलास भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला उपविभागीय अधिकारी निलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, पंचायत समिती सभापती वैशाली बोंबले, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. भुमरे म्हणाले, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाणंद रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना गाळ काढायचा असेल, त्यांना त्वरित परवानगी द्यावी. अपूर्ण राहिलेली कामे पुन्हा सुरू करावीत. कामे लवकर पूर्ण करावीत, असे आदेश त्यांनी दिले. तालुक्यातील एकही शेती रस्त्याविना राहता कामा नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांबाबत ग्रामपंचायतींनी तात्काळ सूचना द्याव्यात. ग्रामसेवकांनी अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले. तहसील कार्यालयात सध्या ७९ पाणंद रस्त्यांबाबत प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली. ही प्रकरणे लवकर मार्गी लावली जातील, असे त्यांनी सांगितले. भूमी अभिलेख अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष अनेक ठिकाणी भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाणंद रस्ते रखडले आहे. यावेळी आमदार भुमरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक सुचना देत धारेवर धरले होते. पाणंद रस्त्याच्या संदर्भात दोन कर्मचाऱ्यांना याच कामावर लक्ष देण्यासाठी द्यावे, अशा सुचना केल्या. यावेळी अक्षय जायभाये, जितू परदेशी, बजरंग लिंबोरे, अक्षय डुकरे, किरण जाधव, नंदूअण्णा पठाडे, दादा गलांडे, सतीश अंधाळे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सातारा-देवळाई परिसरात उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भपात रॅकेटचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे काळजाचा थरकाप उडवणारे वास्तव समोर येत आहे. केवळ पैशांच्या हव्यासापोटी या टोळीने माणुसकीची हद्द ओलांडली होती. धक्कादायक म्हणजे ही टोळी ज्या मशीनने सोनोग्राफी करत होती ती मशीन चायना मेड असून ही फक्त पोटाच्या विकारासाठी उपयोगात येऊ शकते. यातून गर्भलिंगनिदान करणे अवघड आहे. त्याचा फक्त अंदाज घेता येऊ शकतो. असे असताना केवळ ७० हजारांसाठी ही टोळी निर्घृणपणे गर्भपात करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे मुलगा असूनही मुलगी सांगून हे क्रूर कृत्य करत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या भागात अशा प्रकारचे भयावह कृत्य सुरू असल्याची कल्पनादेखील आजूबाजूच्या लोकांना नव्हती. अचानक पोलिसांनी छापा टाकल्यानंतर हा प्रकार उघड झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. पोलिस आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. तेथे जे साहित्य सापडले ते एखाद्या सुसज्ज हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये असणारे आहे. सलाइन, गर्भपाताच्या प्रतिबंधित गोळ्या, रक्तस्राव थांबवणारी आणि कळा येणारी इंजेक्शन्स, योनीमार्गातील अडथळे दूर करणारी सर्जिकल साधने पाहून तपास करणारी टीमदेखील अवाक् झाली. सिल्लोड येथील डॉ. विकास आहेरला अटक छत्रपती संभाजीनगर | सातारा-देवळाई परिसरात उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भपात रॅकेट प्रकरणात लिंगनिदान करून महिलांना एजंटकडे पाठवणारा सिल्लोड येथील डॉ. विकास आहेर याला पोलिसांनी सोमवारी (६ एप्रिल) बेड्या ठोकल्या. दरम्यान, मुख्य आरोपी ज्योती पवार हिच्या देवळाईतील घरावर पोलिसांनी छापा टाकला. तेथून गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रतिबंधित गोळ्यांचा मोठा साठा, तपासणीची उपकरणे आणि सर्जिकल साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत (७ दिवस) पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सहायक सरकारी वकील सविता हिवराळे यांनी न्यायालयात गेल्या दीड वर्षांत नेमके किती गर्भपात झाले? भ्रूणांची विल्हेवाट कशी लावली जात होती? प्रतिबंधित औषधांचा पुरवठा कोण करत होते याचा सखोल तपास होणे बाकी आहे. परत येताना तेथे बाहुलीसारखे दिसले “सकाळी आम्ही या परिसरात काम करत होतो. १० मिनिटांपूर्वीच रस्त्यावरून गेलो, तेव्हा तेथे काहीही नव्हते. मात्र, थोड्या वेळाने परत येताना तेथे बाहुलीसारखे काहीतरी पडलेले दिसले. जवळ जाऊन पाहिले असता ते लहान अर्भक असल्याचे लक्षात येताच पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. या पैशांतून सुरू लक्झरी लाइफ आरोपी ज्योती पवार ही खासगी रुग्णालयात काम करायची, मात्र या अवैध धंद्यातून तिने स्वतःची कार आणि घर खरेदी केले असल्याचे समोर आले आहे. आरोपी वर्षा हिच्या कायम संपर्कात होते. महागडे कपडे, ब्रँडेड मोबाइल आणि उच्च दर्जाचे राहणीमान होते. त्या मोठ्या घरातच ऑपरेशन थिएटर सुरू असल्याचेदेखील तपासात समोर आले आहे. या घरालादेखील पोलिसांनी कुलूप लावले होते. मुकुंदवाडीतील राजनगर भागातील रस्त्यावर अर्भक फेकून अज्ञात पसार छत्रपती संभाजीनगर | एकीकडे रॅकेटचा तपास सुरू असतानाच, मुकुंदवाडीतील राजनगर भागात सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ४ ते ५ महिन्यांचे अर्भक रस्त्यावर बेवारस अवस्थेत आढळले. सहायक पोलिस निरीक्षक संजय बहुरे यांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेतले आणि पुढील तपासणीसाठी घाटी रुग्णालयात रवाना केले. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल केला. एजंटचे जाळे : डॉ. विकास आहेर हा निल्लोडमधून महिलांना शहरात ज्योती पवार आणि वर्षा जाधव या परिचारिकांकडे पाठवण्याचे काम करायचा. जागा बदलण्याची शक्कल : कारवाई टाळण्यासाठी या महिला एकाच ठिकाणी गर्भपात न करता सतत जागा बदलत असत. कधी कधी तर नातेवाइकांनाच “जागा ॲरेंज’ करायला लावली जायची. महिलेकडे मायेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. आईपणाचे महत्त्व जाणणाऱ्या या महिलांनीच हा गोरखधंदा पैशांसाठी सुरू केला होता. सुरक्षित गर्भपातासाठी किमान ८ तास लागतात, मात्र पोलिसांनी पकडू नये म्हणून रक्तस्राव सुरू असतानाही अवघ्या २ तासांत ही जीवघेणी प्रक्रिया उरकली जायची. हा निव्वळ फसवणुकीचा धंदा पोर्टेबल मशीनच्या स्क्रीनवर बाळ मुलगा आहे की मुलगी हे सामान्य व्यक्तीला समजू शकत नाही. हे तोतया डॉक्टर याचाच फायदा घेतात. अनधिकृत ठिकाणी गर्भपात केल्याने गर्भपिशवी फाटू शकते किंवा महिलेचा जीव जाऊ शकतो. -डॉ. श्रीनिवास गडप्पा, प्रसूती विभागप्रमुख, घाटी दिव्य मराठी इनसाइड स्टोरी या संपूर्ण रॅकेटचे मुख्य केंद्र सिल्लोड तालुक्यातील निल्लोड हे गाव होते. ७० हजार रुपये ठरले की साखळी पद्धतीने वाटणी व्हायची. अशा प्रकारच्या गुन्ह्यात यापूर्वी पोलिसांच्या ताब्यात आणि वाळूज छाप्यात अटक असलेला कुख्यात डॉ. सुनील राजपूत हा डॉक्टर १५ हजार रुपये घेऊन पोर्टेबल मशीनसह गरोदर महिलेच्या घरी जायचा. मुलगा असला तरी मुलगी असल्याचे सांगून तो महिलांना गर्भपातासाठी प्रवृत्त करायचा अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. १. पुरवठादार कोण?: गर्भपातासाठी लागणाऱ्या प्रतिबंधित गोळ्या आणि सर्जिकल साहित्य या टोळीला कोण पुरवत होते?२. प्रशिक्षण : गलिच्छ आणि धोकादायक परिस्थितीत गर्भपात करण्यासाठी या महिलांना कुणाकडून ट्रेनिंग मिळत होते?३. दलाल सक्रिय : शहरात आणि ग्रामीण भागात या महिलांकडे गरोदर मातांना पाठवणारे नेमके किती दलाल सक्रिय आहेत?
वरद हॉस्पिटल ते सिग्मा हॉस्पिटलदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. वारंवार सूचना देऊनही हे अतिक्रमण काढले जात नसल्याने अखेर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनाच प्रशासनाविरुद्ध रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करावे लागले. सोमवारी (६ एप्रिल) सकाळी भाजप नगरसेविका शोभा बुरांडे आणि अर्चना नीळकंठ या विक्रेत्यांना समज देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, विक्रेत्यांनी त्यांना उद्धटपणे उत्तरे देत धमकावले. या प्रकारामुळे संतप्त होऊन नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केले. घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार आणि महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने धाव घेतली. पथकाने तातडीने रस्त्यावरील विक्रेत्यांचे साहित्य व हातगाड्या जप्त करून रस्ता मोकळा केला. प्रशासकीय सुस्तीवर ताशेरे भाजी विक्रेत्यांना पीरबाजारात स्वतंत्र जागा दिलेली असतानाही ते फुटपाथवर बसून वाहतूक कोंडी करत आहेत. या आंदोलनावर बोलताना शैलेंद्र नीळकंठ आणि प्रदीप बुरांडे यांनी इशारा दिला की, जर पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली, तर पुढचे आंदोलन थेट दर्गा चौकात करण्यात येईल. विशेष म्हणजे, महापालिकेत सत्ता असूनही स्वतःच्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींना रस्त्यावर उतरावे लागल्याने प्रशासकीय कार्यक्षमतेवर शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भोंदू खरात याने पोलिसांसमोर अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महिलांना धमकावल्याची आणि हातचलाखीने आकर्षित करून त्यांचे शोषण केल्याची, “दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए’ अशी धक्कादायक कबुली खरातने पोलिस कोठडीत दिली. ज्या गोष्टींना लोक चमत्कार किंवा वशीकरण समजतात, ती केवळ आपली हातचलाखी असल्याचेही त्याने मान्य केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने पोलिस कोठडीत अनेक खुलासे केले. मात्र केलेल्या कृत्याचे समर्थन करताना कोणत्याही प्रकारचा पश्चात्ताप व्यक्त केला नाही. उलट, महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ‘ट्रिक्स’ला त्याने विज्ञानाचे नाव दिल्याने पोलिस यंत्रणेच्या भुवया उंचावल्या आहेत. पीडित महिलांना मानसिक दबावाखाली आणून त्यांच्यावर वर्चस्व निर्माण केले. ज्या गोष्टींना लोक चमत्कार अथवा वशीकरण समजतात, तेच हातचलाखीने केल्याचे त्याने मान्य केले. खरात आता कबुलीत वारंवार विज्ञान युगाचा संदर्भ देत आहे. जे काही केले, ते लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि विज्ञानातील काही क्लृप्त्या वापरून केल्याची कबुली त्याने दिली. विकृत मानसिकतेचे दर्शन खरातने दिलेल्या जबाबानंतर त्याने कोणत्या हातचलाखीचा वापर केला, त्याला अन्य कुणाची मदत होती का, याचा तपास सुरू आहे. खरातच्या “झुकानेवाला चाहिए” या एका वाक्याने त्याच्या विकृत मानसिकतेचे प्रदर्शन समोर आले आहे. भोंदू खरातच्या पत्नीचा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज शिर्डी | खरातची पत्नी कल्पना खरात हिने अटकेपासून वाचण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पोलिसांनी तिच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केलेली असतानाच, तिने आपल्या वकिलामार्फत राहाता न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात अशोक खरात आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध फसवणूक तसेच बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यात कल्पना खरातचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून, ती फरार होऊ नये यासाठी यापूर्वीच यंत्रणांना सतर्क करण्यात आले होते. वारसदार ‘तृप्ताबाला’ एसआयटीच्या रडारवर, १०० कोटींच्या मालमत्तेची दिवसभर चौकशी भोंदू खरातच्या काळ्या साम्राज्यातील अनेक गुपिते एसआयटीच्या तपासात एक-एक करून बाहेर येत आहेत. एसआयटीने आता आपला मोर्चा खरातच्या मुलीकडे वळवला असून, तिची सोमवारी चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बापाने तृप्ताबाला या मुलीच्या नावे जमिनींसह स्थावर-जंगम अशी एकूण १०० कोटींची मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खरात १९ दिवसांपासून पोलिस कोठडीत आहे. त्याच्या चौकशीत नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. एसआयटीच्या हाती लागलेल्या जमिनी, फ्लॅट्स आणि विविध ठिकाणी गुंतवणूक केलेल्या कागदपत्रांनुसार, खरातने कमावलेली बेकायदेशीर मालमत्ता मुलगी तृप्तबाला हिच्या नावे केलेली असल्याचे तपासात समोर आले आहे. यामध्ये मोकळे भूखंड, आलिशान फ्लॅट्स आणि काही बेनामी व्यवहारांचा समावेश असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. खरातने भोंदूगिरीने केवळ भविष्यच सांगितले नाही, तर आपल्या कुटुंबालाही या आर्थिक साखळीत ओढल्याचे स्पष्ट झाले. आज होणाऱ्या चौकशीत एसआयटी काय पावले उचलणार याकडे लक्ष लागले आहे. खरातवर ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल; लवकरच त्याची व संबंधितांची होणार चौकशी दोन पतसंस्थांमधील अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार आणि हवालामार्फत बांधकाम व्यावसायिक व डॉक्टरांच्या माध्यमातूनमोठ्या रकमा वळवल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भोंदू अशोक खरातविरुद्ध सोमवारी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. लवकरच याप्रकरणी त्याची व त्याच्याशी संबंधितांची चौकशी केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. केंद्रीय संस्थेच्या मुंबई विभागीय कार्यालयाने प्रतिबंधात्मक मनी लाँड्रिंग कायद्याच्या (पीएमएलए) विविध कलमान्वये अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) दाखल केला आहे. खरातविरोधात महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या अनेक एफआयआरची दखल ईडीने घेतली आहे. एका विवाहित महिलेने तीन वर्षांपासून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर खरातला १८ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. राज्य पोलिसांनी त्याच्यावर आतापर्यंत एकूण १५ गुन्हे दाखल केले आहेत. लेकीच्या नावे मालमत्तेचा डोंगर खरातने लेकीच्या नावे गौळणे, पाथर्डी रोडवर मोक्याचे प्लॉट खरेदी केले आहेत. त्याने उभारलेल्या कंपन्यांमध्ये मुलीची भागीदारी आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. मुलीच्या बँक खात्यातील कोट्यवधींचे व्यवहार नेमके कुणाशी संबंधित आहेत, याचा तपास होणार आहे. खरातची पत्नी कल्पना अजूनही फरार आहे. तिच्या अटकपूर्व जामिनासाठी शिर्डीत अर्ज दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, खरातच्या मुलाची एसआयटीने चौकशी केली, मात्र तो ‘ डॅडला माहिती’ हेच सातत्याने सांगत आहे. चौकशीच्या ससेमिऱ्यापासून वाचण्याकरिता तो दोन दिवस नॉट रिचेबल होता. तर दुसरी मुलगी सृष्टीच्या नावेही खरातने प्लॉट खरेदी केले असून पथकाकडून खरातची लेक व जावई यांनाही चौकशीकरिता बोलावणार आहेत.
सोलापुरात पुतळे बसवणाऱ्या टोळीचा मास्टरमाइंड’ जालन्याचा:जिल्ह्यामध्ये आतापर्यंत घडल्या नऊ घटना
सोलापूर, धाराशिवसह राज्यातील काही जिल्ह्यात रातोरात महापुरुषांचे पुतळे उभारण्याचा नवा ‘ट्रेंड’ निर्माण झाला आहे. कुठलीही परवानगी न घेता हे पुतळे उभारले जात असले तरी हा अतिशय संवेदनशील विषय असल्यामुळे पोलिस व जिल्हा प्रशासनही हतबल झाले होते. मात्र हा फक्त भावनिक विषय नसून त्यामागे सामाजिक अशांतता निर्माण करणारे व व्यावसायिक षड्यंत्र असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात अशा ९ घटना घडल्या आहेत. त्यापैकी चार प्रकरणांत सहभाग असल्याचे उघड झालेल्या मास्टरमाइंडला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. बाळराजे रामराज आवारे (रा. महाकाळ, ता. अंबड जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे. या कटामागे त्याची एक टोळीच कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाळराजे आवारे याचा प्लास्टिकचे पुतळे बनवण्याचा कारखाना आहे. आपला उद्योग वाढवण्यासाठी त्याने सोशल मीडियाचा आधार घेत समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला. आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करायची व नंतर संबंधित गावात पुतळा उभारण्यासाठी त्याची यंत्रणा कामाला लावायचा. मार्केटिंग व प्रसिद्धीसाठी त्याने स्वतंत्र पथके तयार केली होती. या माध्यमातून तो गावकऱ्यांमध्ये भावनिक आवाहन करण्यात तरबेज झाला होता. विशेष म्हणजे, अवघ्या २५ ते ३० हजार रुपयांत तयार होणारा फायबरचा पुतळा तो गावातील तरुणांना चिथावून एक ते सव्वा लाखांना विकायचा. आरोपीच्या षड्यंत्रामागे राजकीय पाठबळ जिल्ह्यात अशांतता निर्माण करण्यासाठी एक टोळी हे काम करत असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही दिली. कायदा व सुव्यवस्था बिघडवून अशांतता निर्माण करण्यासाठी ही टोळी काम करते. पुतळा बसवणारे वेगळे, समाज माध्यमात शांतता पसरवणारे वेगळे यासाठी कट रचणारे असे काम ही टोळी करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आधी या टोळीने मराठवाड्यात अशी कामे केली नंतर सोलापूरला टार्गेट केले. या टोळीमागे राजकीय पाठबळ असल्याचाही संशय आहे.
अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम आता थेट विकासकामांवर होताना दिसतोआहे. आखाती देशातून रस्त्यांसाठी आयात होणारा डांबराचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे डांबराची किंमत 2 महिन्यांत ३० हजार रुपये प्रति टन वाढली आहे. एकीकडे कमी पुरवठा अन् दुसरीकडे दरवाढीच्या कात्रीत सापडलेल्या कंत्राटदारांनी खरेदीही थांबवली आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे २४ हजार किमी रस्ते डांबरीकरण मंदावले आहेत. पावसाळ्यात डांबरीकरण होत नसल्याने दोन महिन्यांत तोडगा न निघाल्यास कामे रखडणार आहेत. रस्त्यांसह अन्य कामांसाठी भारतात डांबराची वार्षिक मागणी सुमारे ९० लाख टन आहे. यापैकी सुमारे ४० ते ४५ टक्के माल हा इराणसह आखाती देशांकडून आयात केला जातो. इराण हा भारताचा सर्वात मोठा डांबर पुरवठादार आहे. परंतु सागरी मार्ग बंद झाल्याने त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. मागणी जास्त पुरवठा कमी असल्याने किमती वाढल्या आहेत. वाढीव दरात डांबर खरेदी परवडेना राज्य शासनाने गेल्या तीन वर्षापासून कंत्राटदारांची बिले अदा केलेली नाहीत. त्यात सर्वच साहित्य क्रेडीटवर खरेदी करणे आता अडचणीचे झाले आहे. जानेवारीत ५४ हजार मेट्रिक टन डांबराचे दर आता ८४ हजारांवर पोहोचले आहेत. टनामागे करासह तब्बल ३० हजारांची वाढ झाल्याने वाढीव दरात खरेदी करणे परवडत नाही. यामुळे राज्यातील २४ हजारापेक्षा जास्त लांबीचे सर्व विभागांकडील डांबरीकरणाचे काम मंदावले आहे. - मिलिंद भोसले, राज्य अध्यक्ष, राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना. कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे कामे थांबण्याची शक्यता जळगाव जिल्ह्यात सुमारे ४५० किमीची डांबरी रस्त्यांची कामे सुरू आहेत. डांबराचे दर वाढले तरी ठेकेदारांना वाढीव दराने खर्च मिळतो. परंतु पुरवठा न झाल्यास त्याचे परिणाम होऊ शकतात. ठेकेदारांच्या काम बंद आंदोलनामुळे कामे थांबण्याची शक्यता आहे. - प्रशांत सोनवणे, अधीक्षक अभियंता, पीडब्ल्यूडी.
नांदेड शहरात मागील ७० तासांत पाच जणांचे खून झाले. पूर्वीच्या दोन घटनांतील तपास सुरू होण्यापूर्वीच ६ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता श्रीनगर येथे शिवसेनेचा माजी युवा सेना शहरप्रमुख सोनू कल्याणकर याची प्रेमप्रकरणातून चाकूने वार करून हत्या करण्यात आली. कल्याणकर याच्या शरीरावर तब्बल १७ घाव होते. त्यांना उपचारासाठी आयटीआय परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक केली आहे. सोनू कल्याणकर यांचे गोलू मंगनाळे याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. मंगनाळे कुटुंबीयांनी सोनू कल्याणकरची समजूत काढून हे प्रेमप्रकरण संपवण्यासाठी प्रयत्न केले; परंतु मंगनाळे याच्या बहिणीची सोयरीक जुळल्यानंतरही सोनू कल्याणकरने ती सोयरीक मोडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यामुळे गोलू मंगनाळे याने २०२१ मध्ये सोनू कल्याणकर याच्यावर घरी जाऊन गोळ्या झाडल्या होत्या. सुदैवाने त्या वेळी सोनू कल्याणकर बचावला होता. नंतरच्या काळात संजय बियाणी हत्या प्रकरणात गोलू मंगनाळेला अटक करण्यात आली. तो सध्या कारागृहात बंदिस्त आहे; परंतु सोनू कल्याणकरचा सूड घेण्यासाठी गोलू मंगनाळे प्लॅन करीत होता. तुरुंगातील त्याचा साथीदार रोहित लोट हा पॅरोलवर सुटल्यानंतर त्याच्यामार्फत सोनू कल्याणकरचा खून करण्याचा प्लॅन करण्यात आला. पोलिसांनी आरोपीच्या पायावर झाडली गोळी मुख्य आरोपी अंकुश गंदमवार हा झरी परिसरात लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडून ताब्यात घेतले. या प्रकरणातील आरोपी प्रसाद ऊर्फ ऋषी शिंदे, कृष्णा जोगदंड, रवी ऊर्फ रोहित लोट यांना अटक केली. मॉर्निंग वॉक करताना गाठले रोहित लोट, अंकुश गंदमवार, प्रसाद ऊर्फ ऋषी शिंदे आणि कृष्णा जोगदंड या चौघांनी कट रचून ६ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता सोनू कल्याणकर श्रीनगरला मॉर्निंग वॉक करत असताना सोनू कल्याणकरला गाठले. त्याच्यावर चाकूचे १७ वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत सोनूला नागरिकांनी रुग्णालयात हलवले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अविनाशकुमार, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. ४ एप्रिल रोजी झाले दोन गँगमध्ये टोळी युद्ध, तिघांचा मृत्यू टोळीयुद्धात अर्जितसिंह चव्हाण, महमद अरबाज आणि सय्यद आवेज या तिघांचा खून झाला होता. ५ एप्रिल रोजी रणजितसिंग तबेलेवाले याची निर्घृण हत्या करण्यात आली तर ६ एप्रिल रोजी सोनू कल्याणकरचा खून करण्यात आला.
विषबाधेत ३ चिमुकल्यांचा मृत्यू
बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे आईसह चार मुलांना विषबाधा झाली होती. यामध्ये तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला. एकाच कुटुंबातील आईसह चार मुलांना विषबाधा झाल्याने ३ लहानग्या बहीण-भावांचा मृत्यू झाला असून आई व एका चिमुकलीवर उपचार सुरु आहेत. मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (४), मशिरा मोहंमद वसीम […] The post विषबाधेत ३ चिमुकल्यांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रेणा कारखानास्थळी अभिषेक, आरती, वृक्षारोपण
रेणापूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आ. धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रेणा सहकारी साखर कारखानास्थळी सोमवारी (दि.६) श्री सिध्दीविनायक मंदीर येथे अभिषेक, आरती व साई मंदीरात आरती करण्यात आली. जिल्हा बँकेचे चेअरमन तथा कारखान्याचे संचालक धिरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रेणा कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकूर, व्हाईस चेअरमन अॅड. प्रवीण पाटील, […] The post रेणा कारखानास्थळी अभिषेक, आरती, वृक्षारोपण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रेणापूर शहर, तालुका काँग्रेसच्या वतीने विविध उपक्रम
रेणापूर : प्रतिनिधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी दि. ६ एप्रिल रेणापूर शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला रेणापूर तालुका, शहर काँग्रेस च्या वतीने रेणापूर येथील रेणुकादेवी मंदीरात महाआरती , ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे […] The post रेणापूर शहर, तालुका काँग्रेसच्या वतीने विविध उपक्रम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराण ठाम, ना होर्मुझ खुले होणार, ना युद्धविराम होणार तेहरान : वृत्तसंस्था पश्चिम आशियातील संघर्ष थांबविण्यासाठी पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की देशांनी मध्यस्थी करीत अमेरिका आणि इराणला ४५ दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, हा प्रस्ताव धुडकावून लावत इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. ना होर्मुझ सामुद्रधुनी खुली होणार, ना युद्धबंदी होणार, […] The post युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कुंभमेळ््याचे हजारावर कामांचे टेंडर मॅनेज?
लाचखोर कक्ष अधिका-याची ऑडिओ क्लिप व्हायरल मुंबई : निधी मंजूर करण्यासाठी मंत्रालयात ६ लाख ३७ हजारांची लाच घेताना अटक करण्यात आलेला कक्ष अधिकारी विलास लाडची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्याने नाशिकमध्ये होणा-या कुंभमेळ््याच्या टेंडरबाबत धक्कादायक दावे करताना दिसत आहे. कुंभमेळ््यासाठीच्या १ हजार २१ प्रकारच्या कामांचे टेंडर मॅनेज करून लोकांना […] The post कुंभमेळ््याचे हजारावर कामांचे टेंडर मॅनेज? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निलंगा येथे गॅसटंचाईविरोधात चुली पेटवून आंदोलन
निलंगा : प्रतिनिधी घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईने हैराण झालेल्या नागरिकांच्या प्रश्नास वाचा फोडण्यासाठी निलंग्यात वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भर उन्हात रस्त्यावर चुली पेटवून भाकरी चहा बनवत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले.दरम्यान उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांच्या निवेदनासह भाकरी-चहा भेट दिल्या. राज्यात सुरू असलेल्या ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून […] The post निलंगा येथे गॅसटंचाईविरोधात चुली पेटवून आंदोलन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा
लातूर : प्रतिनिधी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या शिक्षण प्रक्रियेतील त्रिसूत्री आहेत. आजची पिढी सुशिक्षित करण्याकडे आपला भर असून संस्काराकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वर्तमान स्थितीत विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पूर्वीची पिढी आई-वडिलांसाठी प्राण द्यायला तयार होत होती, परंतु आजची पिढी त्यांच्यासुध्दा प्राणावर उठली आहे. विनयशीलता, श्रद्धाभाव आणि संवेदनशीलता या बाबींचा […] The post संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर : प्रतिनिधी युवकांचे प्रेरणास्थान, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रोकडेश्वर मंदिर येथे रोकडेश्वर महाराजांचा अभिषेक व आरती करण्यात आला. तसेच त्याांना सुख, समाधान, उत्तम आरोग्य व उदंड आयुष्यासाठी रोकडेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली. यावेळ जिल्हा परिषद सदस्य महादेव मस्के, कृषी उच्चतम बाजार समिती सदस्य युवराज जाधव, माजी पंचायत समिती […] The post रोकडेश्वरला अभिषेक व आरती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारदान्याअभावी हरभ-याची खरेदी ठप्प
लातूर : प्रतिनिधी लातूरच्या आडत बाजारात हरभ-याला हमीभावापेक्षा ३०० ते ४०० दर कमी मिळत असल्याने शेतकरी हमीभाव खरेदी केंद्राकडे वळले. शेतक-यांनी २३ हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी केल्यानंतर ज्या शेतक-यांना हरभरा विक्रीसाठी एसएमएस पाठवले. ते शेतकरी शेतमाल विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्रावर जाऊ लागले. मात्र हमीभाव खरेदी केंद्रावरील बारदाना संपल्याने गेल्या आठ दिवसापासून हरभ-याची खरेदी ठप्प झाली […] The post बारदान्याअभावी हरभ-याची खरेदी ठप्प appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांनी टोक गाठले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, या महायुतीच्या प्रयत्नांना काँग्रेसने सुरुंग लावत आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याने खळबळ उडाली आहे. यावरून पार्थ पवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधल्यानंतर, काँग्रेसने अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पार्थ पवारांचा 'कृतघ्न' असा उल्लेख करत अत्यंत बोचरी टीका केली आहे. यामुळे बारामतीतील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिल्याने पार्थ पवार यांनी संताप व्यक्त केला होता. काँग्रेसला कळायला हवे की ते काय करत आहेत. त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला माहिती नाही, पण लोक हे विसरणार नाहीत. या निर्णयामुळे भविष्यात त्यांना महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल, असा इशारा पार्थ पवारांनी दिला होता. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेसने नेमके काय म्हटले? पार्थ पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसने त्यांच्या राजकीय परिपक्वतेवरच बोट ठेवले. धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? अशा शब्दांत काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले. सरेंडर झालेल्यांनी काँग्रेसबद्दल न बोललेले बरे स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील, असा खोचक सल्ला काँग्रेसने पार्थ पवार यांना दिला. आमच्या उमेदवाराच्या मागणीवर बोलायला हवे या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे. असेही काँग्रेसने म्हटले आहे. हे ही वाचा… बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचा काँग्रेसला अधिकार:शरद पवार यांचे विधान, पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेवरही भाष्य काँग्रेस हा एक मोठा आणि स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक निवडणुकीत कुणीतरी विरोधात लढणारच, हे गृहीत धरूनच रिंगणात उतरावे लागते. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याबाबत अधिक चर्चा करण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारीकीची शपथ घेतली. यानंतर दिल्लीत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी बारामती पोटनिवडणूक, अशोक खरात प्रकरण, पार्थ पवार यांसह विविध मुद्द्यावर भाष्य केले. सविस्तर वाचा…
भारतीय जनता पक्षाच्या वतीने चांदूर बाजार येथे 'पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान' अंतर्गत २४ तासांचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात विविध खेळ, व्यायाम पद्धती तसेच भजन-कीर्तनाचा मेळ साधण्यात आला, ज्यामुळे वातावरण प्रेरणादायी आणि ऊर्जावान बनले होते. या शिबिरात अनेक मान्यवर वक्त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. नयनाताई जोशी यांनी वैचारिक अधिष्ठानावर, डॉ. विलास कविटकर यांनी इतिहास व विकासावर, माधव अवघड यांनी कार्य विस्तार व दृष्टिकोनावर, तर रुपेश ढेपे यांनी कार्यपद्धतीवर माहिती दिली. साबुलाल दहिकार यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी तुषार खेरडे यांनी सोशल मीडियाविषयी माहिती दिली. गजानन कोल्हे यांनी 'मन की बात', एआय (AI), नमो ॲप आणि सरल ॲप यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. या शिबिरातून कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणी, पक्षाची विचारधारा, शासकीय योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याबाबत सखोल माहिती मिळाली. आमदार प्रवीण तायडे यांनी शिबिराला उपस्थित राहून कार्यकर्त्यांना प्रेरित केले. गजानन कोल्हे यांच्या प्रेरणादायी समारोपपर भाषणाने शिबिराची सांगता झाली. मंडळाध्यक्ष रमेश तायवाडे यांनीही या शिबिरात महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिस्तबद्ध उपस्थिती आणि समर्पण यामुळे हे शिबिर संस्मरणीय ठरले.
अमरावती येथे झालेल्या किसान-मजूर परिषदेत भारत-अमेरिका कृषी करारावर तीव्र टीका करण्यात आली. या करारामुळे भारतीय शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याचा धोका असल्याचे मत प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. महेंद्र मेटे यांनी मांडले. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का देणारे निर्णय सातत्याने घेतले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हा शाखेतर्फे येथील सुदामकाका भवनात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भाई प्रा. अरविंद वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस अशोक सोनारकर, प्रा. विजय रोडगे, प्रा. साहेबराव विधळे आणि बांधकाम कामगार फेडरेशनचे राज्य सचिव संजय मंडवधरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रा. डॉ. महेंद्र मेटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, केंद्र सरकारने केलेला हा करार भारतीय शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक ठरेल आणि तो शेतकऱ्यांना गुलाम बनवण्यासारखा आहे. विकसित देशांतील मोठ्या प्रमाणावर अनुदानित शेतीसमोर भारतीय लहान शेतकरी तग धरू शकणार नाहीत, या वास्तवाकडे दुर्लक्ष करून हा करार पुढे रेटला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकजूट होऊन या धोरणांविरोधात उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. या परिषदेत अखिल भारतीय किसान सभा, भारतीय खेत मजदूर युनियन आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन कौन्सिल (आयटक) या संघटनांचा सक्रिय सहभाग होता. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या, अपुऱ्या मोबदल्याचा प्रश्न आणि पुनर्वसनातील त्रुटी यावरही सखोल चर्चा करण्यात आली. इतर वक्त्यांनी भारतीय शेतीवर वाढत असलेल्या परकीय दबावावर चिंता व्यक्त केली. भारत-अमेरिका करारामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती असून, हा लढा केवळ कराराविरोधात नसून भारतीय शेतीच्या अस्तित्वासाठी असल्याचे मत त्यांनी मांडले. शेती वाचवायची असेल, तर केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांविरोधात कठोर संघर्ष करावा लागेल, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या परिषदेचे प्रास्ताविक किसान सभेचे पुढारी सतीश चौधरी यांनी केले, तर प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी एम. वाय. शहाणे, धनंजय मस्के, राजेश चर्जन, अर्चना भांडवलकर, लक्ष्मणराव धाकडे, जे. एम. कोठारी, निळकंठ ढोके, प्रा. प्रफुल कडू यांच्यासह जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अमरावती येथे १० एप्रिल रोजी ज्येष्ठ गझलकार भीमराव पांचाळे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 'पुस्तकतुला' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जमा झालेली पुस्तके स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या स्थापनेनिमित्त आयोजित या कार्यक्रमात भीमराव पांचाळे यांची विशेष गझल मैफलही रंगणार आहे. हा कार्यक्रम सांस्कृतिक भवनात होणार आहे. भीमराव पांचाळे हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील आष्टगावचे मूळ रहिवासी आहेत. त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाचा भाग म्हणून असोसिएशनने हा उपक्रम हाती घेतल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष नितेश राऊत आणि सचिव सूरज दहाट यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. भीमराव पांचाळे हे सुरुवातीपासूनच पुस्तकप्रेमी आहेत. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त होणाऱ्या पुस्तकतुलेतून जमा होणारी ग्रंथसंपदा जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासकांना दिली जाईल. यामुळे भविष्यात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा असोसिएशनने व्यक्त केली आहे. यावेळी असोसिएशनचे मार्गदर्शक यशपाल वरठे, उपाध्यक्ष स्वप्नील उमप, सहसचिव अनिरुद्ध दवाळे, कोषाध्यक्ष अमोल देशमुख, कार्यकारिणी सदस्य संजय शेंडे, सुरेंद्र आकोडे, अमर घटारे, शुभम बायस्कर, अनिकेत दहातोंडे आदी उपस्थित होते. भीमराव पांचाळे हे मराठी गझल गायकीला वेगळा साज चढवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या मैफलीत 'जखमा कशा सुगंधी, अंदाज आरशाचा...', 'अंदाज आरशाचा वाटे खरा असावा...', 'तू नभातले तारे...', 'आयुष्य तेच आहे...', 'मी किनारे सरकताना...' अशा त्यांच्या अनेक लोकप्रिय गझला ऐकायला मिळतील. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक आणि गझलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी आज, सोमवारी सकाळी आपला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सर्व विभागांची पाहणी केली. तसेच, कॅन्टीनमध्ये पराठा आणि मठ्ठा घेऊन त्याचे बिल ऑनलाइन भरल्याने त्यांच्या कार्यशैलीची चर्चा सुरू आहे. सीईओ गांधी यांनी अतिरिक्त सीईओ विनय ठमके यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी 'वैदर्भी' या जिल्हा परिषदेच्या कॅन्टीनला भेट दिली. तिथे त्यांनी पराठा आणि मठ्ठा घेतला आणि ऑनलाइन पद्धतीने शंभर रुपयांचे बिल अदा केले. पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी सर्व विभागांची पाहणी करून कॅन्टीनमधील पदार्थांची चव घेणारे सत्यम गांधी हे पहिले सीईओ ठरले आहेत. २०२१ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असलेले गांधी यापूर्वी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त होते. त्यामुळे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करण्याचा अनुभव आहे. पाहणीदरम्यान, त्यांनी प्रत्येक विभागात जाऊन विभागप्रमुखांचे दालन, त्यांची उपस्थिती, कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे आणि सामान्यांना विभागप्रमुखांची ओळख व्हावी यासाठी नेमप्लेटची अनिवार्यता यावर भर दिला. बांधकाम उपविभागातील एक विभागप्रमुख अनुपस्थित आढळल्याने त्यांनी लगेच त्यांच्या दौऱ्याची नोंद रजिस्टरमध्ये आहे की नाही, याची चौकशी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी आणि स्वीय सहायक ज्ञानेश्वर घाटे उपस्थित होते. प्रत्येक विभागातील विभागप्रमुखांशी बोलताना सीईओंनी कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती घेतली. काही कर्मचाऱ्यांशी, विशेषतः आयटीशी संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांनी शासनाच्या ई-गव्हर्नन्ससाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांची एकप्रकारे पडताळणी केली.
अमरावती जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला. कामात कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेणार नाही, तसेच भ्रष्ट प्रवृत्तीला थारा देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली. कार्यालयात बसून काम करण्याऐवजी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करण्याला आपले प्राधान्य असेल, असेही त्यांनी सांगितले. सांगली-मीरज-कुपवाड मनपा आयुक्त म्हणून काम केलेल्या आणि त्यापूर्वी डहाणू सारख्या आदिवासी भागात अनुभव घेतलेल्या सत्यम गांधी यांनी सांगितले की, विकसित भागात विकास कामे करणे सोपे असते, मात्र ग्रामीण भाग विकासापासून दूर असतो. जिल्हा परिषद ही प्रामुख्याने गाव-खेड्यांसाठी काम करणारी यंत्रणा आहे. त्यामुळे शासनाने सोपवलेली जबाबदारी आपण चोखपणे पार पाडू. गांधी म्हणाले की, मला कार्यालयात बसण्याऐवजी प्रत्यक्ष गाव-खेड्यात पोहोचून तेथे काय आवश्यक आहे, हे जाणून घेण्यात अधिक रस आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार आठवड्यातून किमान दोन दिवस जिल्ह्याचा दौरा करेन. डहाणू सारख्या आदिवासी प्रदेशात काम केल्याचा अनुभव असल्याने मेळघाटच्या अडचणींची मला जाणीव आहे. तेथील मुले-मुली शहरी विद्यार्थ्यांसारखीच तल्लख व्हावीत, यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहे. विशेषतः, त्या मुलांना इंग्रजी विषयात निपुण करायचे आहे. गणित, विज्ञान आणि सामान्य ज्ञान हे विषयही त्यांच्यासाठी महत्त्वाचे असल्याने त्यावरही विशेष लक्ष देणार आहे. मेळघाटच्या समस्या दूर करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तात्काळ अतिरिक्त सीईओ विनय ठमके यांच्याकडून सूत्रे घेतली. त्यानंतर विभागप्रमुखांची ओळख करून घेतली. सुमारे तासभर त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील प्रत्येक विभागाची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या कॅन्टीनमध्ये नाश्ता केला. आपले व्हिजन काय, या प्रश्नावर गांधी यांनी मेळघाटच्या समस्या दूर करणे हे आपले प्राधान्य असल्याचे सांगितले. मी स्वतः पूर्णवेळ काम करेन आणि इतरांची हयगय खपवून घेणार नाही. फिल्ड व्हिजिटमध्ये कोणते गाव निवडणार, यावर ते म्हणाले की, अद्याप ते ठरले नाही. मंगळवारपासून सर्व विभागांच्या बैठका घेऊन त्यानंतर फिल्ड व्हिजिटचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल. डहाणूतील अनुभवाच्या आधारे मेळघाटसाठी नवीन मॉडेल तयार केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
39 आमदारांच्या राजीनाम्यासाठी ‘सीटू’ची निदर्शने:भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून अमरावतीत आंदोलन
महिलांच्या इभ्रतीवर हात घालणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातवर कठोर कारवाईची मागणी करत, त्याच्या संपर्कातील ३९ आमदारांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी कलेक्ट्रेटवर आंदोलन करण्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची कामगार संघटना ‘सीटू’ आणि जनवादी महिला फेडरेशनच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. सध्या राज्यात भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात अनेक राजकीय पुढारी गुंतले असून, राज्य महिला आयोग आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. खरातची अनेक प्रकरणे समोर येत असून, दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहेत. ‘सीटू’च्या मते, या प्रकरणात राज्यातील ३९ आमदार गुंतले आहेत. त्यामुळे सरकारने या सर्व आमदारांचे राजीनामे घेतले पाहिजेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी निदर्शकांनी तीव्र घोषणाबाजीही केली. या आंदोलनात ‘सीटू’चे सुभाष पांडे, रमेश सोनुले, राजेंद्र भांबोरे, संध्या खांडेकर, पंजाबराव शिंदे, तसेच जनवादी महिला संघटनेच्या वहिदा कलाम, पद्माताई गजभिये, चित्राताई बोरकर, चंदाताई वानखडे, नीलू मेश्राम, मालती मोहोड, मनीषा गोरे, सुनीता भोवते, रेखा वानखडे, रेहाना खान, शमा परविन, अरुणा मालविय, वंदना बुरांडे, किरण रंगारी, वैशाली नेवारे, निता मेश्राम, ममता काळे, संगीता वानखडे, मुकूंद काळे, प्रभाकर आकोटकर आदी सहभागी झाले होते.
राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राहुरीत अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. प्रबळ दावेदार मानले जाणारे प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर करत, राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेण्यामागचे कारणही सांगितले. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून प्राजक्त तनपुरे शड्डू ठोकणार, अशी जोरदार चर्चा होती. तनपुरे यांनी या निवडणुकीसाठी मोठी तयारीही केली होती, ज्यामुळे राहुरीत चुरशीची लढत पाहायला मिळेल, अशी सर्वांची धारणा होती. फडणवीसांचा फोन आणि तनपुरेंची माघार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपायला काही अवधी उरला असतानाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये बराच वेळ बंद दाराआड खलबते झाली. विशेष म्हणजे, या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोनवरून तनपुरे यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर आणि भाजप नेत्यांच्या शिष्टाईनंतर तनपुरे यांनी आपला पवित्रा बदलला आणि निवडणुकीतून माघार घेण्याचे निश्चित केले. प्राजक्त तनपुरेंनी फेसबुकवरील पत्रात काय म्हटले? निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी फेसबुकवर एक सविस्तर पत्र पोस्ट करत, निवडणुकीतून माघार घेण्यामागचे कारण सांगितले. प्राजक्त तनपुरे पत्रात लिहिले की, “आपल्या राहुरी तालुक्याचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याचा ध्यास मनात ठेवून मी या विधानसभा पोटनिवडणुकीकडे पाहत होतो. याच जाणिवेतून राहुरीच्या विकासासाठी, इथल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, युवकांच्या स्वप्नांसाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी मी ही पोटनिवडणूक लढविण्याचा निर्धार केला होता. परंतु, आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी माझी भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही पोटनिवडणूक न लढवण्याची विनंती केली. या चर्चेदरम्यान मी त्यांच्यासमोर राहुरीच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले. राहुरीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या आणि मला समाधान आहे की त्या सर्व मुद्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या मान्य केल्या.” प्राजक्त तनपुरे म्हणाले, “जरी आपल्या राहुरीचा आमदार दुसऱ्या तालुक्यातील होणार असला, तरी राहुरीच्या विकासात कोणतीही तडजोड होणार नाही, असा ठाम विश्वास आणि आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांच्या या विनंतीचा मान राखत आणि स्व. शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली अर्पण करत मी ही राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नाही. पण हा निर्णय म्हणजे आपली लढाई थांबली असा अजिबात अर्थ नाही. आपण दोन पावले मागे घेतली आहेत. पण आता त्यानंतर चार पावले पुढे जाण्याची तयारी आहे. राहुरीच्या विकासाची, आपल्या हक्काची ही लढाई अशीच सुरू राहील अधिक ताकदीने, अधिक निर्धाराने.” प्राजक्त तनपुरे म्हणाले, “या संपूर्ण प्रवासात माझे कुटुंबीय, हितचिंतक आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आपण सर्व कार्यकर्ते ज्या ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात, त्या प्रत्येकाचा मी मनापासून ऋणी आहे. तुमचा विश्वास, तुमचं प्रेम, आणि तुमची साथ हीच माझी खरी ताकद आहे. यापुढील काळात देखील आपण असेच प्रेम द्याल व माझ्या पाठीशी उभे रहाल हा विश्वास आहे.”
तामिळनाडूत ९ पोलिसांना मृत्युदंड
चेन्नई : वृत्तसंस्था २०२० मध्ये गाजलेल्या सथानकुलम पोलिस कोठडीतील हत्या प्रकरणात न्यायालयाने निकाल दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणात तामिळनाडू पोलिस दलातील ९ जणांना दोषी धरले आहे. त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना अतिदुर्मीळ असल्याचे न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. पोलिसांनी केलेला गुन्हा अतिशय निर्घृण असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. […] The post तामिळनाडूत ९ पोलिसांना मृत्युदंड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते बारामतीत एकवटले होते. मात्र, या राजकीय वातावरणात माजी आमदार अमोल मिटकरी यांनी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत गोजुबावी येथील विमान अपघातस्थळी जाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिटकरी यांनी या ठिकाणी एक अत्यंत हृदयस्पर्शी पत्र ठेवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. २८ जानेवारी २०२६ रोजी गोजुबावी येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या मिटकरी यांनी याच 'दुर्दैवी' स्थळाला भेट दिली. या ठिकाणाला त्यांनी 'बलिदान स्थळ' असे संबोधले असून, तिथे गेल्यानंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अमोल मिटकरींनी पत्रात काय म्हटले? आदरणीय दादा, 28 जानेवारी 2026 च्या काळ्या दिवसानंतर आज आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या बारामती पोटनिवडणुकीच्या निमीत्ताने दुसयोध गोजुबावी ह्या दुर्देवी स्थळी आलोय. बारामती मधे तुम्ही नाही म्हणजे पंढरीत विठ्ठल नाही. आता हा शेवटचा पत्रव्यव्हार तुमच्या बलिदान स्थळी. बलिदान स्थळ म्हणजे महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलेल तुमचं बलिदान. तुमच्या बाबत मात्र महाराष्ट्र दुदैवी ठरला की तुम्ही दुर्देवी ठरला हे कोडं आता मरेपर्यंत उलगडणार नाही. गोजुबावीचं रहस्य या माळरानावर दबलयं. आज माझ्या भावना निशब्द आहेत. तुम्ही दिलेली जवाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. आता तुमचं जाणं हे गुढ राहू नये. तुम्हाला न्याय मिळाला पाहीजे. राज्यातील तुमच्या चाहत्यांना एकत्र करुन नवा लढा उभारेल. इतकीच सेवा करु शकलो. तुम्ही दिलेला बॅच आणि आय कार्ड तुमच्या चरणी अर्पण. माफी असावी! ओळखपत्र आणि बॅच चरणी अर्पण अजित पवार यांनी दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडली, अशा शब्दांत आपली निष्ठा व्यक्त करताना मिटकरी यांनी त्यांना दिलेला पक्षाचा बॅच आणि ओळखपत्र (आय कार्ड) त्याच ठिकाणी अर्पण केले. इतकीच सेवा करू शकलो, माफी असावी, असे म्हणत मिटकरींनी आपला शोक व्यक्त केला. हे ही वाचा… करुणा मुंडेंही बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात:अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल, म्हणाल्या - प्रजातंत्र वाचवण्यासाठी लढणार बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच, आता या मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला खरा, मात्र त्यांच्या विरोधात आता करुणा मुंडे यांनी शड्डू ठोकला आहे. करुणा मुंडे यांनी आज अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरल्याने बारामतीचा राजकीय पारा अचानक वाढला आहे. सविस्तर वाचा…
पत्नीचा खून; नांदेड जिल्ह्यातील सहावा खून
मुखेड : प्रतिनिधी मुखेड तालुक्यातील मौजे कर्णा येथे एका विवाहितेचा पतीनेच साडीच्या पदराने गळा आवळुन खून केल्याची घटना दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात आरोपी पत्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीस पोलिसांनी अटक केले आहे. मुखेड तालुक्यातील मौजे कर्णा येथील आरोपी मारुती रामकिशन उर्फ बाबुराव […] The post पत्नीचा खून; नांदेड जिल्ह्यातील सहावा खून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच, आता या मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला खरा, मात्र त्यांच्या विरोधात आता करुणा मुंडे यांनी शड्डू ठोकला आहे. करुणा मुंडे यांनी आज अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरल्याने बारामतीचा राजकीय पारा अचानक वाढला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी आजपर्यंत ६८ उमेदवारी अर्ज आले आहेत. महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण काँग्रेसने याठिकाणी आकाश विश्वनाथ मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनीही आज आपला अर्ज दाखल केला आहे. तसेच याआधी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते, मात्र त्यांनी आता निवडणुकीतून माघार घेतली आहे. या निवडणुकीचा निकाल २३ एप्रिल रोजी लागणार आहे. करुणा मुंडे काय म्हणाल्या? उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना करुणा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, गेल्या 10 दिवसांपासून मी बिनविरोध निवडणुकीच्या गप्पा ऐकत आहे. पण लोकशाहीत मतदारांना निवडीसाठी चॉईस (पर्याय) असायला हवा. कोणत्याही मोठ्या पक्षाने किंवा तगड्या उमेदवाराने अजून धाडस दाखवले नाही, म्हणून मी एक सक्षम पर्याय म्हणून जनतेसमोर आले आहे. निवडणूक झालीच पाहिजे, तरच प्रजातंत्र वाचेल विशेष म्हणजे, मी बारामती पाहिलेली नाही, त्यामुळे तिथे नक्की काय विकास झाला आहे याची मला कल्पना नाही. मात्र, अनेक बारामतीकर माझ्याकडे मदतीसाठी आले, त्यांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढवत आहे. मी केवळ बारामतीचे मुद्दे घेऊन लढत नाहीये, तर संपूर्ण राज्यातील अन्यायाविरुद्ध हा माझा लढा आहे. बारामतीमधील सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकऱ्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. जर मतदारांनी मला संधी दिली, तर त्या संधीचे सोनं करून मी गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र काम करेन, असे साद त्यांनी बारामतीकरांना घातली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात चांगल्याच भावुक झाल्या. बारामतीची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे. अजितदादांचे हे विचार होते. त्यांच्यानंतर मी माझे दुःख तळघरात कोंडून तुमच्या सेवेसाठी पुढे आले आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या. बारामती ही अजित पवारांची श्वास होती. त्यामुळे त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला. त्यांचा येथील प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळा, इमारतींना स्पर्श झाला. त्यामुळे आज या सर्व गोष्टी त्यांच्या आठवणीने रडत आहेत. पण मी स्वतः माझे दुःख तळघरात कोंडले आणि अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले, असे त्या आपले आतापर्यंत दाबून ठेवलेले अश्रू मोकळे करताना म्हणाल्या.
केरळमधील शबरीमला मंदिर प्रवेश प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात ९ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ७ एप्रिलपासून (आजपासून) अंतिम सुनावणी होणार आहे. ही सुनावणी शबरीमला मंदिरापुरती मर्यादित नसून धार्मिक स्वातंत्र्य, महिलांचे अधिकार आणि समानता यासारख्या महत्त्वाच्या घटनात्मक प्रश्नांवरती त्यात उहापोह करणार आहे. या खंडपीठाचे नेतृत्व सरन्यायाधीश सूर्यकांत करणार असून न्या. बी. व्ही. नागरत्ना, न्या. एस. एम. सुंदरेश, न्या. अहसानुद्दीन अमानुल्ला, […] The post शबरीमला मंदिर सुनावणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी; ७० वर्षीय महिलेला मिळाले नवजीवन
लातूर : प्रतिनिधी येथील विलासराव देशमुख शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी मेंदूतील अत्यंत गुंतागुंतीच्या आणि जीवघेण्या ‘अॅन्युरिझम’ या आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करून एका ७० वर्षीय महिला रुग्णाचे प्राण वाचविले आहेत. या यशस्वी उपचारामुळे शासकीय रुग्णालयातील अत्याधुनिक न्युरोसर्जरी सुविधा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. संबंधित रुग्ण महिला डोकेदुखी, उलट्या आणि अचानक शुद्ध हरपणे अशा गंभीर तक्रारींसह रुग्णालयात […] The post मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी; ७० वर्षीय महिलेला मिळाले नवजीवन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धिरज देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
लातूर : प्रतिनिधी लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ६ एप्रिल रोजी विविध ठिकाणी समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करुन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मांजरेश्वर हनुमान येथे अभिषेक करून माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या उदंड आयुष्यासाठी मनोकामना करण्यात आली. बोरी येथे नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर […] The post धिरज देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे महानगरपालिका (PMC) अनधिकृत ओव्हरहेड केबल्स टाकणाऱ्या कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली. शहराचे सौंदर्य बाधित होत असून, जीवितहानीचा धोका वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग आणि अग्निशमन विभागाने आज फरासखाना, बेलबाग आणि बुधवार पेठ परिसरात अनधिकृत केबल्सवर संयुक्त कारवाई केली. या कारवाईनंतर पत्रकारांशी बोलताना भिमाले यांनी पुढील कठोर कारवाईची घोषणा केली. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार, महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ३,६०० किलोमीटर लांबीच्या केबल्स अनधिकृत असल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आले आहे. नियमांनुसार केवळ भूमिगत केबल टाकण्याची परवानगी असतानाही अनेक कंपन्यांनी खांबांवर अनधिकृतपणे केबल्स टाकून शहराचे विद्रुपीकरण केले आहे. शहरातील अनेक रस्ते, चौक आणि इमारतींवर केबल्सचे गुंतागुंतीचे जाळे निर्माण झाले आहे, ज्यामुळे अपघात घडले आहेत. काही कंपन्या गायरोपचा वापर करतात, ज्यात ॲल्युमिनियम तारांचा समावेश असल्याने विजेचा धक्का लागून मनुष्यहानी होण्याची भीती आहे. अशा अनधिकृत केबल्सवर धडक कारवाई केली जात आहे. कारवाई केल्यानंतरही काही कंपन्या पुन्हा नव्याने अनधिकृत केबल्स टाकतात. अशा कंपन्यांवर आता फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील, असे भिमाले यांनी स्पष्ट केले. केबल्स टाकण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी आणि शुल्क भरणे अनिवार्य आहे. विविध सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी महापालिकेकडून रीतसर परवानगी घेऊन केवळ भूमिगत केबल्सच टाकाव्यात. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर पुढील काळात कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सेवा पुरवणाऱ्या छोट्या ऑपरेटर किंवा 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्यांना या कारवाईमुळे अडचण निर्माण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. या संदर्भात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या दालनात आज छोट्या ऑपरेटरच्या शिष्टमंडळासोबत एक बैठक घेण्यात आली. महापौरांच्या निर्देशानुसार, छोट्या ऑपरेटर कंपन्यांसाठी एक नियमावली तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या नियमावलीचे पालन करून महापालिकेत रीतसर शुल्क जमा करणे बंधनकारक राहील. एक एप्रिलपासून शहराच्या विविध भागांमध्ये ही कारवाई सातत्याने सुरू आहे. आतापर्यंत सुमारे शंभर किलोमीटरच्या केबल्स हटविण्यात आल्या आहेत. आगामी महिनाभरात सुमारे तीन हजार किलोमीटरच्या केबल्स हटविण्याचे उद्दिष्ट असल्याचे भिमाले यांनी नमूद केले.
दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा परिसरात एका अज्ञात कारने सुरक्षा यंत्रणेला चकवा देत थेट आत प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली. बॅरियर तोडून विधानसभा परिसरात प्रवेश केल्यानंतर, संबंधित कारने तेथून पळ काढला. या अनपेक्षित घटनेमुळे तिथे तैनात असलेले सुरक्षा रक्षक काही काळ गोंधळून गेले. ही घटना विधानसभेच्या गेट क्रमांक २ जवळ घडली. घटनेची माहिती मिळताच दिल्ली […] The post दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
न्यू यॉर्क : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता केवळ जमिनीवर किंवा हवेत मर्यादित राहिलेले नाही, तर ते डिजिटल युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. आमच्यावर लष्करी हल्ले थांबले नाहीत, तर आम्ही जगाला अंधारात ढकलून देऊ असा इशारा इराणच्या काही लष्करी गटांनी दिला आहे. इराणने आता जगाला ऑफलाईन करण्याची धमकी दिली आहे. इराणच्या सागरी हद्दीतून जाणा-या आणि […] The post आता जगाला ‘ऑफलाईन’ करू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पाकच्या शांतता प्रस्तावाला इराणने धुडकावले
तेहरान : इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. मात्र, आता पाकिस्तानने तयार केलेला १५ सूत्रीय शांतता प्रस्ताव इराणने नाकारल्याचे समोर आले आहे. युद्धविरामाबाबत कोणतीही चर्चा इराणच्या राष्ट्रीय हितांच्या आधारेच होईल, अशी स्पष्ट भूमिका इराणने घेतली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानने अमेरिका आणि इराण या दोन्ही […] The post पाकच्या शांतता प्रस्तावाला इराणने धुडकावले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चीनकडून सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी
बीजिंग : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगावर महायुद्धाचे सावट असतानाच, ड्रॅगन म्हणजेच चीन एक वेगळीच खेळी खेळत आहे. चीन सध्या पिसाटल्यासारखी सोन्याची आणि चांदीची खरेदी करत आहे. या खरेदीमागे चीनचा एक मोठा सीक्रेट प्लॅन असून तो थेट अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देणारा ठरू शकतो. इराण-अमेरिका युद्धाचा जागतिक पुरवठा साखळीवर आणि डॉलरच्या स्थिरतेवर परिणाम होण्याची […] The post चीनकडून सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : देशभरात एलपीजीचा तुटवडा जाणवतो आहे, स्वयंपकासाठी लोकांना एलपीजी सिलिंडर मिळत नाहीये. आम्ही विरोधक म्हणून या प्रश्नी सातत्याने आवाज उठवत आहोत. तरीही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही पावले उचलायला तयार नाहीत. त्यांचा हा कारभार कोव्हिड काळातल्या नीतीशून्य कारभारासारखाच आहे असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान […] The post मोदींचा कारभार नीतीशून्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
४ मे नंतर सर्वांचा हिशेब होणार
कूचबिहार : मालदामध्ये न्यायालयीन अधिका-यांना घेराव घालण्याची घटना म्हणजे, पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या ‘महा जंगलराज’चे लक्षण असल्याचे टीका पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केली. विधानसभा निवडणुका सत्ताधारी पक्षाने पसरवलेल्या ‘भय’ आणि भाजपच्या ‘भरोसा’ यांच्यातील लढत असल्याचेही मोदी यांनी म्हटले आहे. कूचबिहार येथे बंगालमधील पहिल्या प्रचारसभेला संबोधित करताना मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. राज्याच्या भविष्यासाठी ही […] The post ४ मे नंतर सर्वांचा हिशेब होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
न्यायाधीशाने केली मृत न्यायाधीशाच्या घरात ‘हातसफाई’
चंडीगड : पंजाबमधील एका न्यायाधीशाने दुुस-या न्यायाधीशाच्या मृत्यूनंतर त्याच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली असून चोरी करणा-या न्यायाधीशांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. कंवलजीत सिंह हे सांगूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. १ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीय […] The post न्यायाधीशाने केली मृत न्यायाधीशाच्या घरात ‘हातसफाई’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ओडिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट
रांची : एकीकडे केंद्र सरकारकडून देशातून नक्षलवाद संपल्याची घोषणा केली गेली असतानाच आज ओदिशा-झारखंड सीमेवर असलेल्या सारंडाच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी आयईडीद्वारे स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात एक जवान गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील नक्षली कारवायांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या भागात घडली आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाकडून परिसरामध्ये […] The post ओडिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मध्यपूर्वेतील युद्धात भारत निभावू शकतो मोठी भूमिका
तेहरान : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. इतके दिवस होऊनही युद्धविराम किंवा होर्मुझ सामुद्रधुनी उघडण्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्किए हे देश मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अजून अंतिम करारावर सहमती झालेली नाही. अशातच, इराणने भारताच्या कूटनीतीचे कौतुक केले आणि भारत […] The post मध्यपूर्वेतील युद्धात भारत निभावू शकतो मोठी भूमिका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘ग्रीन आशा’ लवकरच मायदेशात येणार
नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या सावटात भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली असून जागतिक तेल व्यापाराचे केंद्र असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील कडक नाकाबंदीतून भारताचे ८ वे व्यापारी जहाज ग्रीन आशा सुखरूप बाहेर पडले आहे. सुमारे २०,००० टन एलपीजी घेऊन हे जहाज रविवारी दुपारी ३:३० वाजता इराणच्या जलक्षेत्रातून […] The post ‘ग्रीन आशा’ लवकरच मायदेशात येणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

27 C