भोंदू अशोक खरात हे प्रकरण केवळ बलात्कार किंवा फसवणुकीपुरते मर्यादित नाही. या प्रकरणात काही लोकांनी जीव दिल्याचाही प्रकार समोर येत आहे, असा दावा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या माहितीमुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अशोक खरातला तब्बल 17 वेळा फोन केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. पत्रकारांनी याविषयी मंत्री संजय शिरसाट यांना छेडले असता त्यांनी थोडी कळ काढा या प्रकरणी सर्व पर्दाफाश होईल असे स्पष्ट केले. ते म्हणाले, भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास पोलिस यंत्रणा करत आहे. एका महिला अधिकाऱ्याने हे सर्व प्रकरण उजेडात आणले आहे. त्याची चौकशी अत्यंत योग्य पद्धतीने सुरू आहे. हा भोंदू बाबा एका प्रकरणात अडकलेला नाही, तर अनेक प्रकरणांत अडकलेला नाही. बलात्कार व मनी लाँड्रिंगच नाही, तर आणखी काही प्रकरणे पुढे येत आहेत. काही लोकांनी जीव देण्याचेही प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे मी सर्वांना विनंती करत आहे की, त्याला राजकारणाकडे वळण देऊ नका. हे सर्व पाहता आपण खरातला वाचवतो की काय? असे वाटते. सर्वांवर 100 टक्के गुन्हा दाखल होईल संजय शिरसाट म्हणाले, प्रस्तुत प्रकरणात अशोक खरात राहिला बाजूला आणि इतरांवरच आरोप प्रत्यारोप होत आहेत. जे काही चौकशीत समोर येईल, मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणताही नेता असू द्या. सरकार त्याच्यावर कारवाई करेल. त्याची कुणीही चिंता करू नये. सध्या रोज एकच विषय चालू आहे खरात व त्याच्याशी संबंधित असणाऱ्या पुढाऱ्यांचा. पुढारी असतील किंवा अधिकारी ज्यांचा - ज्यांचा या प्रकरणात समावेश असेल, त्या सर्वांवर कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणात हात असलेल्या लोकांवर 100 टक्के गुन्हा दाखल केला जाईल हे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपण प्रतिक्षा केली पाहिजे. कशाचे फोन होते, काय होते हे पाहावे लागेल. माझेही फोटो आहेत. याचा अर्थ मी गुन्हेगार असेल तर मी सुद्धा जेलमध्ये गेले पाहिजे. मी कुणालाही स्पेअर करा असे म्हणत नाही. पण खरातने ज्या पद्धतीचे गुन्हे गेलेत, ते महाराष्ट्राच्या इतिसात असे करणारा तो पहिला गुन्हेगार असावा. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी ही सर्वसामान्य लोकांसह आमचीही इच्छा आहे. थोडी कळ काढा सर्व पर्दाफाश येईल, असे शिरसाट म्हणाले. इंदू मिलमधील बाबासाहेबांचा पुतळा डिसेंबरपर्यंत बसवण्याचा प्रयत्न संजय शिरसाट यांनी यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचाही संकल्प केला. ते म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर जयंती सर्व लोकांनी मिळून एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने कशी साजरी करता येईल यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचना केल्या आहेत. ही आंबेडकर जयंती अधिक जल्लोषात व्हावी असा सरकारचा मानस आहे. त्या पद्धतीनेच ही जयंती साजरी होईल. मुख्यमंत्र्यांशी इंदू मिलच्या पुतळ्यासंबंधीही चर्चा झाली. त्यांनी मला पुन्हा एकदा तिकडे जाऊन पाहणी करण्याची सूचना केली. मी लवकरच नोएडाला जाऊन पाहणी करेन. सध्याच्या युद्धामुळे काही माल येण्यास विलंब होत आहे. त्याचे दरही वाढलेत. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शासनानेही त्यालाही मान्यता दिली आहे. पुतळ्याचे थांबणार नाही. डिसेंबरपर्यंत हा पुतळा येथे बसवण्याचा आमचा मानस आहे. त्या पद्धतीने आमची तयारी सुरू आहे. पुतळ्याला लागणाऱ्या मालात किती दरवाढ झाली? याची माहिती आमच्याकडे नाही. पण हे सगळ्या जगात दरवाढ झाली आहे. अशावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे काम कुठेही थांबता कामा नये हा आमचा प्रयत्न आहे, असे शिरसाट म्हणाले.
संजूबाबा राऊत हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी सांगितले की 3 वर्षे निवडणुकीसाठी आहेत, त्यानंतर लोकसभा निवडणूक आहे. 3 वर्षांनंतरचे उमेदवार आतापासून ठरवले पाहिजे, संघटन बांधणी आतापासून केली पाहिजे. निवडणूक कोण लढणार याबद्दल निर्णय घेतला पाहिजे असा सल्ला संजूबाबा राऊत यांनी जळगावमध्ये बसून उद्धव ठाकरेंना दिला आहे. कारण उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाही, आदित्य ठाकरे घराबाहेर पडत नाही, असा टोला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे. उबाठा गटातील दुफळी संजय राऊतांनी जो उबाठाला घरचा आहेर दिला त्यावरुन दिसून येते. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत तुमच्या सरकारने शेतकऱ्यांना काहीही मदत केली नाही. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करत नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. हे सरकार शेतकऱ्यांचा विचार करणारे आहे. म्हणून कोणतीही निवडणूक नसताना देवाभाऊंच्या सरकारने शेतकरी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. मविआने केवळ आश्वासन दिले आणि घरात बसून कारभार केला. 'संकटमोचक' रस्त्यावर, तर तुमचे नेते 'घरकोंबडे नवनाथ बन म्हणाले की, संकटमोचक रस्त्यावर उतरतात, शेतकऱ्यांमध्ये जातात त्यांची कामे करतात. तुमचे नेते कुठे आहेत? तुम्ही घरकोंबडा म्हणून काम करतात. ते जळगावमध्ये जात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे जाणार आहेत का? आदित्य ठाकरे मराठवाड्यात नुकसानीची पाहणी करणार का? मागच्या वेळी तुम्ही पाहणी करायला गेले आणि ड्रायफ्रुटस खात बसले. संकटमोचकावर बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही ते जनतेमधील नेते आहेत. राऊत एक काय ते ठरवा नवनाथ बन म्हणाले की, जळगावमध्ये उबाठाची गुंडगिरी सुरू आहे. संदीप कर्णिक नावाचे अधिकारी चांगले काम करतात म्हणतात नेमके एकच काही तरी सांगा. कुणाच्या दरबारात कोण जात होते हे राऊतांनी सांगू नये. खरातचे कारनामे समोर येताच त्याला अटक करण्याची हिंमत देवाभाऊंनी केली. भाजप सरकार कोणतेही चुकीचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाठिशी घालत नाही. उद्धव ठाकरे सरकारने वाझे सारख्या खंडणी वसूल करणाऱ्यालादेखील समर्थन केले आहे. मविआत समन्वय नाही नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेस परस्पर उमेदवार देणार असे जाहीर करते. त्यांच्यामध्ये समन्वय नाही. हे आपल्याला प्रत्येक निवडणुकीत दिसून आले. संजय राऊत हे शरद पवारांची प्रवक्तेगिरी करत राहुरीवर शरद पवारांचा हक्क आहे सांगत आहेत. त्यांचे असे झाले आहे की मीठ उबाठाचे खायचे अन् काम शरद पवारांचे करायचे.
कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक येथील वाळूघाटावरील गौण खनिज उत्खनन प्रकरणात कंत्राटदारास तब्बल ८५ लाख रुपये दंडाची नोटीस उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी दिली आहे. या प्रकरणी ४८ तासात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक शिवारातील वाळूघाटाचा लिलाव झाला होता. सदर लिलावातून वाळू घाट सिध्दांत बिल्डींग मटेरीयलचेे सिध्दांत नरवाडे कुपटी यांनी घेतला आहे. या वाळू घाटाच्या लिलावामध्येच सर्व अटी व शर्ती नमुद करण्यात आल्या होत्या. त्यानुसार वाळू घाटातून नियमानुसार ८९० ब्रास वाळू उपसा करणे अपेक्षीत होते. त्यानुसार या ठिकाणी वाळू उपसा करून वाहतूक केली जात होती. मात्र वाळू घाटावर चार बोटीद्वारे वाळू उपसा करून चार जेसीबीद्वारे वाळू व मुरुम भरून ११ हायवा द्वारे वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना यांच्या पथकाने ता. २७ मार्च रोजी रात्री छापा टाकला असता त्या ठिकाणी काही हायवामध्ये मुरुम तर काही हायवामध्ये वाळू आढळून आली. तसेच घाटावरील जेसीबीद्वारे रस्ता तयार करण्याचे काम केले जात असल्याचे पथकाला दिसून आले. त्यावरून सहाय्यक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना यांच्या पथकाने चार बोटी जाळून नष्ट केल्या तर ११ हायवा व चार जेसीबी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात जमा केल्या आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केला. त्यामध्ये ८९० ब्रास वाळू उपसा करणे अपेक्षीत असतांना प्रत्यक्षात १००० ब्रास वाळू उपसा केल्याचे अहवालात नमुद केले या शिवाय लिलावातील अटी व शर्तीचा भंग केल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावरून उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी सिध्दांत बिल्डींग मटेरीयलचे सिध्दांत नरवाडे यांना नोटीस दिली असून यामध्ये एकूण दंडात्मक रक्कम ८५.७० लाख रुपये का आकारले जाऊ नये तसेच पुढील काळात अनाधिकृतरित्या गौणखणीज उत्खनन व वाहतूक करणार नाही याचे बंध प्रमाणपत्र का घेण्यात येेऊ नये याचा खुलासा ४८ तासात सादर करावा अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपविभागीय अधिकारी भुते यांनी दिला आहे.
सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भोंदू अशोक खरात यांच्यात तब्बल 17 वेळा फोनवरून बोलणे झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. एकनाथ शिंदे व अशोक खरात यांच्यात 17 वेळा फोनवरून बोलणे झाले. एवढेच नाही तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही खरातला एक-दोन नव्हे तर तब्बल 177 वेळा फोन केले होते. हे एवढे कॉल त्यांनी का केले होते? याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे दमानिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री आशिष शेलार व शिंदे गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर हे ही वेळोवेळी भोंदू खरातच्या संपर्कात होते, असे दमानिया यांनी स्पष्ट केले आहे. अंजली दमानिया शुक्रवारी यासंबंधी बोलताना म्हणाल्या, कोणताही विषय लढण्यास सुरुवात केल्यानंतर माझ्याकडे बरीच माहिती येते. असाच काहीसा प्रकार आत्ता झाला आहे. अशोक खरातच्या प्रकरणाची खूप मोठी माहिती माझ्याकडे येत आहे. ती मी माध्यमांनाही देत आहे. पण काही कारणामुळे मी आता चंदीगडला आले आहे. लग्नानिमित्त रविवारपर्यंत मी परत येणार नव्हते, म्हणून मला वाटले की ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. मला एक सीडीआरची कॉपी मिळाली आहे. ही कॉपी व्हॉट्सएपवर ज्यांनी पाठवली, त्यांना मी ओळखत नाही. पण मी ती पोलिस महासंचालक व मुख्यमंत्र्यांना पाठवली. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनाही मी ही माहिती दिली. काल दिवसभरात मी माहिती थोडीशी संकलित केली. त्यात मला धक्कादायक माहिती मिळाली. रुपाली चाकणकर आतापर्यंत म्हणायच्या की अशोक खरात हे माझे गुरू आहेत. मला त्यांच्याविषयी फार काही माहिती. पण चाकणकरांनी खरातला सुमारे 177 कॉल्स केल्याची माहिती माझ्याकडे आहे. एवढेच नाही तर त्यांच्या भगिणी प्रतिभा चाकणकर यांचेही तब्बल 236 कॉल्स खरातला गेले. एकनाथ शिंदे - खरातमध्ये 17 वेळा बोलणे अंजली दमानिया म्हणाल्या, प्रस्तुत प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आतापर्यंत केवळ फोटो व व्हिडिओ पाहिले. पण शिंदे यांनी अशोक खरातला तब्बल 17 कॉल केल्याची माहिती माझ्याकडे आहे. हे सर्व नॉर्मल फोन कॉल्स आहेत. त्यांच्यात व्हॉट्सएप किंवा इतर माध्यमातून किती कॉल झाले याची माहिती मला नाही. पण 17 पैकी 10 इनकमिंग व 7 आऊटगोईंग कॉल होते. त्यात एकदा दोघांत तब्बल 21 मिनिटांचे संभाषण झाले. ही सगळी माहिती एक जबाबदार नागरीक म्हणून मी यंत्रणांना दिली. माझी ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची इ्च्छा होती. त्यामुळे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे. यात माझा दुसरा कोणताही हेतू नाही. चंद्रकांत पाटील, तटकरे, शेलारचाही फोन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अशोक खरातसारख्या व्यक्तीशी 17 वेळा फोन करत असतील तर त्यांनी ते कशासाठी केले याचे उत्तर त्यांनी देण्याची गरज आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे 8 कॉल्स आहेत. सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत. आशिष शेलार यांचाही 1 कॉल आहे. हे सर्व नॉर्मल कॉल्स आहेत. कारण, व्हॉट्सएप कॉल्सची माहिती आपल्याला मिळू शकत नाही. या लोकांनी एकमेकांशी नॉर्मल कॉल एवढे केले असतील तर व्हॉट्सएपवरून किती संभाषण केले असेल हे सांगता येत नाही, असे त्या म्हणाल्या. चाकणकर- खरात यांच्यात 33,727 सेकंद संभाषण अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, प्रस्तुत सीडीआरमध्ये अशोक खरात व तृप्ती खरात यांच्यात सर्वाधिक वेळा बोलणे झाल्याचे नमूद आहे. कुटुंबातील व्यक्तीशी जास्त बोलणे होते, हे आपण समजू शकतो. पण त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रुपाली चाकणकर यांचे नाव आहे. त्यांनी सुमारे 33 हजार 727 सेकंद एवढे संभाषण खरातशी साधले आहे. त्यामुळे चाकणकरांना अटक करून त्यांची चौकशी झाली पाहिजे. सर्वप्रथम त्यांच्यावर एफआयआर दाखल करून अटक झाली पाहिजे. एवढा वेळ कुणीही आपल्या गुरुशी बोलू शकत नाही. दोघांमध्ये एवढे मोठे संभाषण होत असेल, तर ती काय बोलत होती? याची चौकशी डेफिनेटली झाली पाहिजे. केसरकरांच्या विश्वासूचे 189 कॉल्स या प्रकरणात तिसरे नाव दीपक लोंढे यांचे आहे. हे माजी मंत्री दीपक केसरकर यांचे अतिशय जवळचे व्यक्ती आहेत. त्यांचे 189 कॉल्स खरातला झाले होते. त्यांनी 30 हजार 579 सेकंद बोलले होते. ही सर्व माहिती धक्कादायक आहेत. अशोक खरातला देश व परदेशातून फोन यायचे. त्याला कतार, यूएई, ऑस्ट्रेलिया, यूएस व्हर्जिन आयलँड, ओमान, ख्रिसमस आयलँड येथूनही खरातला फोन येत होते. ही सर्व माहिती एसआयटीला दिली आहे. त्यावर पूर्ण चौकशी झाली पाहिजे. माझ्याकडे जी-जी माहिती येईल, ती माहिती मी यंत्रणेला देईल, असे दमानिया म्हणाल्या.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तांबाळा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा काही अज्ञात हल्लेखोरांनी स्पोर्ट्स कार्ड खेळणाऱ्या एका क्लबमध्ये अचानक प्रवेश करत दहशत माजवली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर पूर्ण तयारीनिशी आले होते. त्यांच्या हातात बंदुका, तलवारी यांसारखी घातक शस्त्रे होती. क्लबमध्ये घुसल्यानंतर त्यांनी उपस्थित लोकांवर हल्ला चढवला. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हवेत गोळीबारही केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे क्लबमधील लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि अनेकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ केली. या हल्ल्यात चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून, सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. एका आरोपीला अटक दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांसाठी ती महत्त्वाचा पुरावा ठरत आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे, तर इतर हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे तांबाळा परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
१८ वर्षांच्या इतिहासात २३ हॅटट्रिक
मुंबई : आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात २३ हॅटट्रिक पाहायला मिळाल्या असून पहिल्या हॅटट्रिकसह सर्वाधिक तीन वेळा आणि एका हंगामात दोन हॅटट्रिकचा पराक्रम हा भारतीय गोलंदांनी करून दाखवला आहे. लक्ष्मीपती बालाजी हा आयपीएलच्या इतिहासात पहिली हॅटट्रिक नोंदवणारा गोलंदाज आहे. पहिल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाकडून खेळताना पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने इरफान पठाण, पीयूष चावला आणि विक्रम […] The post १८ वर्षांच्या इतिहासात २३ हॅटट्रिक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावेत, या उद्देशाने आता समर्थ रामदास स्वामी रचित 'मनाचे श्लोक' सक्तीचे करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी हा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव समोर येताच एमआयएम पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. एमआयएमचे गटनेते विजय उबाळे यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. उबाळे यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले की, शाळा हे शिक्षणाचे मंदिर आहे, तिथे कोणत्याही विशिष्ट धर्माच्या शिकवणीची सक्ती करणे चुकीचे आहे. शाळांमध्ये धर्माधारित शिक्षण देण्याऐवजी विद्यार्थ्यांना संविधानाचे मूल्य आणि त्यातील कर्तव्यांचे शिक्षण द्यायला हवे. एमआयएमने विरोध केल्यानंतर त्यावर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपण पाहिले तर त्यांच्या मनपावर मनाच्या श्लोकांचा परिणाम होता असे विधान केले आहे. यामुळे त्यांच्यावर टीका होण्यास सुरूवात होताच त्यांनी माफी मागत यापुढे अशी जोडणी करण्यात येणार नाही. माझ्या बोलण्याचा उद्देश वेगळा होता पण तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते असे त्यांनी म्हटले आहे. किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या? एमआयएमने विरोध केल्यानंतर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मनाचे श्लोकाला कुणीतरी विरोध केला असे मला समजले. त्याला विरोध करण्याची काहीच गरज नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपण जर आपण पाहिले त्यांच्या मनावर मनाच्या श्लोकांचा परिणाम दिसतो. मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामी यांनी लिहले आहेत. मनपाच्या अनेक शाळा आहेत, त्यांचे लाखात विद्यार्थी आहेत जर असे असतील तर त्यांच्या मनावरती खऱ्या अर्थाने सर्व जाती-धर्म पंथाच्या लहान मुलांवर संस्कार व्हावे म्हणून मनाचे श्लोक फक्त हिंदूचे आहेत असे म्हणू नये. अशी जोडणी पुन्हा करणार नाही- पेडणेकर यानंतर विरोधकांनी टीका करण्यास सुरूवात करताच किशोरी पेडणेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, मी अशी जोडणी पुन्हा करणार नाही. त्या माध्यमातून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मी माफी मागते. पण माझा उद्देश होता. कोणत्याही जाती पंथाचा नागरिक चांगला घडावा आणि आपल्या देशाच्या संविधानाचे कर्तव्य आणि अधिकार त्याला कळेल असे म्हणायचे होते. पण यापुढे अशी जोडणी होणार नाही.
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भोंदू अशोक खरातची भेट घेतल्याचा पुनरुच्चार केला आहे. नीलम गोऱ्हे यांनी अनेकदा भोंदू अशोक खरातची भेट घेतली. या भेटीवेळी उपस्थित असलेल्या लोकांनीच मला माहिती दिली होती. याचे पुरावे योग्य वेळी व योग्य ठिकाणी सादर केले जातील, असे त्या म्हणाल्यात. दरम्यान, रुपाली चाकणकरांनी स्वतःहून एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे, असेही त्या म्हणाल्यात. तृप्ती देसाई यांनी काही दिवसांपूर्वी नीलम गोऱ्हे यांनी अशोक खरातची भेट घेतल्याचा आरोप केला होता. पण गोऱ्हे यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे हे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर आज तृप्ती देसाई यांनी आपण आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, नीलम गोऱ्हेंची माहिती पूर्णतः खरी आहे. गोऱ्हे यांनी अशोक खरातच्या ऑफिसमध्ये त्याची भेट घेतली होती. या भेटीवेळी उपस्थित असलेल्या लोकांनी मला ही माहिती दिली आहे. त्यामुळे ही गोष्ट एखाद्या त्रयस्त व्यक्तीने दिलेली नाही. ज्या काही गोष्टी आहेत व साक्षीदार आहेत ते योग्य वेळी समोर येऊन बोलतील. शिवसेनेच्या लोकांनीच दिली नीलम गोऱ्हेंची माहिती तृप्ती देसाईंनी यावेळी सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच आपल्याला ही माहिती दिल्याचेही आवर्जुन स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, मला माहिती देणारी एक व्यक्ती नाशिक, तर दुसरी पुण्याची आहे. त्यांनी तूर्त मला हे प्रकरण एसआयटी व त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जात नाही, तोपर्यंत आमचे नाव घेऊ नका असे सांगितले आहे. कारण, त्यांच्या कुटुंबीयांवर दबाव आणला जाऊ शकतो. त्यांचे स्टेटमेंट बदलण्यासाठी त्रास दिला जाऊ शकतो. पण जेव्हा केव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते लोक स्वतः समोर येतील किंवा मी त्याचे पुरावे समोर आणेल. हे लोक शिवसेनेत फार मोठे पदाधिकारी आहेत किंवा नाही हे मी आत्ता सांगणार नाही. पण त्यांची विश्वासार्हता चांगली आहे. ते योग्यवेळी मीडिया, एसआयटी व एकनाथ शिंदेंपुढे नीलम खरात व अशोक खरातच्या भेटीची माहिती देतील. शिंदे सेनेच्या लोकांकडून या प्रकरणात माझा वापर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांच्याकडे अनेक नेते व प्रवक्ते आहेत. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाच्या लोकांनी मला पुरावे दिल्याचा आरोप केला. पण ते मोठ-मोठे लोक आमच्याकडे कशाला येतील? त्यांनी त्यांच्या त्यांच्या विरोधी पक्षांना व प्रवक्त्यांना सांगितले असतील. पण यातील माहिती पूर्णपणे खरी आहे, त्याचे पुरावे योग्यवेळी योग्य ठिकाणी सादर केले जातील, असे त्या म्हणाल्या. अशोक खरातने काळे पैसे पांढरे केले तृप्ती देसाई यांनी यावेळी अशोक खरात नॉमिनी असणाऱ्या 100 हून अधिक बँक खात्यांवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, सध्या अशोक खरातच्या बाबतीत दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. आता नागरी पतसंस्थेत 100 हून अधिक बोगस खाते उघडण्यात आली. त्यात अशोक खरात स्वतः नॉमिनी आहे. यावरून काही जणांनी त्याचा काळा पैसा पांढरा करण्याचे काम केल्याचे स्पष्ट होते. आता हे प्रकरण पुढे आल्यानंतर रुपाली चाकणकरांच्या भगिणी असतील, त्यांचे नातेवाईक किंवा इतर कुणी असतील. त्यांची चौकशी एसआयटी करेल. जे काही सत्य असेल ते समोर येईल. पेनड्राईव्ह कुठे अडकले? त्या म्हणाल्या, 2025 मध्ये श्रीरामपूरच्या एका वृत्तपत्राने बातमी दिली. त्यानंतर महिला आयोगाने त्यावर दबाव टाकला. त्या वृत्तपत्राच्या संपादकाने फोन करून मला या प्रकरणाची माहिती दिली होती. त्यांनी मला या प्रकरणातील पेनड्राईव्ह आल्यानंतर ते देण्याचे सांगितले होते. परंतु या प्रकरणी बातमी आल्यानंतर खरात अलर्ट झाला. यामुळे जे लोक पेनड्राईव्ह घेऊन येणार होते, त्या संपादकाला देणार होते ते आलेच नाहीत. यामुळे ते संपादकही माझ्याकडे आले नाही. त्यानंतर आम्ही या प्रकरणाचा फॉलोअप घेतला असता आम्हाला असा निरोप आला की, नोव्हेंबर - डिसेंबरच्या दरम्यान पेनड्राईव्ह मिळतील. पण त्याचवेळी पोलिस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे पेनड्राईव्ह देणाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला व ते पेनड्राईव्ह गायब करण्यात आले. चाकणकरांनी स्वतः चौकशीला सामोरे जावे तृप्ती देसाई यांनी यावेळी रुपाली चाकणकरांना स्वतःहून एसआयटी चौकशीला सामोरे जाण्याचेही आवाहन केले. रुपाली चाकणकर यांनी आपल्याला कोणताही समन्स मिळाला नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधकांनी पेरलेल्या बातम्या दुर्दैवी आहेत. पण त्यांना निश्चितच समन्स मिळेल. त्यांची चौकशी होईल. त्यांनी स्वतः तातडीने या प्रकरणाच्या चौकशीला सामोरे जावे अशी माझी मागणी आहे, असे त्या म्हणाल्या.
नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात आता नवीन वाद निर्माण झाला आहे. लेखिका अरुणा सबाने यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महिलांनाही दोषी धरून कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात अशोक खरात नावाचा व्यक्ती स्वतःला ज्योतिषी म्हणवत महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचा आरोप आहे. गोड बोलून, कधी धमकी देऊन तो महिलांना आपल्या कार्यालयात बोलावत असे. तेथे त्यांना पेढा आणि कडवट चवीचे पेय देऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. एवढंच नव्हे तर या सर्व घटनांचे चित्रीकरणही केल्याचे तपासात समोर आले आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर 17 मार्च रोजी पोलिसांनी खरातला अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी नवा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून, ज्या महिला स्वेच्छेने खरातकडे गेल्या त्यांना ‘पीडित’ न म्हणता दोषी मानून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी पत्रात नमूद केलं आहे की, काही व्हिडिओ पाहिल्यानंतर महिलांना जबरदस्ती किंवा गुंगीचे औषध दिल्याचे स्पष्ट दिसत नाही, तर त्या स्वतःहून सहभागी झाल्यासारख्या वाटतात. त्यामुळे अशा महिलांवरही कायदेशीर कारवाई व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सबाने यांनी आणखी एक मागणी करत माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही कारवाई करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, सर्व महिला सुशिक्षित असूनही अशा भोंदू व्यक्तीच्या आहारी कशा जातात, हा मोठा प्रश्न आहे. ज्या महिलांना कुटुंबीयांनी जबरदस्तीने पाठवले असेल त्यांना पीडित मानता येईल, मात्र स्वेच्छेने गेलेल्या महिलांना सूट देऊ नये, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या पत्रामुळे प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून संबंधित महिलांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतर संशयितांची चौकशी सुरू या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणाही अधिक सक्रिय झाल्या आहेत. अशोक खरातचा मुलगा सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. सुरुवातीला तो काही बोलत नव्हता, मात्र नंतर त्याने घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम येत असल्याचे सांगितले. या पैशांचे स्रोत आणि व्यवहारांची माहिती वडिलांकडेच होती, असे त्याने कबूल केले आहे. तसेच, या प्रकरणाशी संबंधित डॉक्टर, आर्थिक व्यवहारातील लोक आणि इतर संशयितांची चौकशी सुरू असून पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, इतिहासकार, लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते प्रा. डॉ. राम पुनियानी यांना ‘भाई वैद्य फाउंडेशन’तर्फे ‘लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. थोर समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या आठव्या स्मृतिदिनी हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना प्रा. डॉ. राम पुनियानी यांनी सामाजिक आंदोलनाचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ लोकशाही यंत्रणेतच सामाजिक आंदोलन उभे राहू शकते आणि त्यातूनच समाज बदलता येतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. समाजात परिवर्तन घडवण्यासाठी आणि शोषितांच्या अधिकारांसाठी लढा उभारणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या मुख्य सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर स्मिता पुनियानी, भाई वैद्य फाउंडेशनच्या सचिव प्रा. डॉ. गीतांजली वैद्य, आरोग्य सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा, आरोग्य सेनेचे केंद्रीय समिती सदस्य संतोष म्हस्के आणि आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य शाखा प्रमुख अतुल रुणवाल उपस्थित होते. प्रा. डॉ. राम पुनियानी यांनी यावेळी बाबरी मशीद विध्वंसावरही भाष्य केले. ६ डिसेंबर रोजी पाडण्यात आलेली बाबरी मशीद ही केवळ एका धार्मिक स्थळाच्या विध्वंसापुरती मर्यादित घटना नव्हती, तर महात्मा गांधींच्या हत्येनंतर भारतीय लोकशाहीवरील तो दुसरा सर्वात मोठा हल्ला होता, असे त्यांनी नमूद केले. बाबरी मशीद नेस्तनाबूत करणे हे केवळ हिंदू-मुस्लिम राजकारणापुरते मर्यादित नसून, दलित, शेतकरी, आदिवासी, शोषित आणि समाजातील मागासलेल्या घटकांचे अधिकार दडपण्याचे षडयंत्र होते, असेही ते म्हणाले. धर्माच्या भावना भडकावून बाबरी मशीद आंदोलन उभे केले गेले. धर्मावर आधारित राजकारण राष्ट्रांची कशी वाताहात करते, हे शेजारील राष्ट्रांकडे पाहून लक्षात येते. अशा राजकारणामुळे लोकशाही संपुष्टात येते आणि इतिहासाचा अभ्यास न करता मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवला जात आहे, असे पुनियानी यांनी सांगितले. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. अभिजित वैद्य म्हणाले की, डॉ. राम पुनियानी यांना आज प्रदान केलेला हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर तो विचारांचा, सत्यशोधनाचा आणि निर्भीड सामाजिक बांधिलकीचा सन्मान आहे. इतिहास, धर्मनिरपेक्षता आणि मानवाधिकार या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आजच्या भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते, असेही त्यांनी नमूद केले.
आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी लावला छडा:मिस्त्री काम करणारा आरोपीला जुन्नरमधून अटक
पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडी येथे गुरुवारी मध्यरात्री एका 6 वर्षांच्या चिमुरडीची गळा आवळून, तर तिला सांभाळणाऱ्या 79 वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यात वार करून हत्या करण्यात आली होती. विनायक तुकाराम भवारी (वय 35, रा. जुन्नर, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हनुमानवाडी येथील रहिवासी संगीता दत्तात्रय गवारी या इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीला गेल्या होत्या. त्यावेळी घरी त्यांची नात धनश्री सोनू दत्तात्रय केदारी (वय 6) आणि तिला सांभाळण्यासाठी शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय 79) या दोघीच होत्या. मध्यरात्री आरोपीने घरात प्रवेश करून गाढ झोपेत असलेल्या धनश्रीचा गळा आवळला, तर मंगल शिंदे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून दोघांचीही हत्या केली. शुक्रवारी सकाळी संगीता गवारी कामावरून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहून त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. आळंदी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि आरोपीचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले.आळंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस. बी. नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनायक भवारी हा मिस्त्री काम करतो. त्याचे तक्रारदार महिलेशी दोन वर्षांपूर्वी दुसरे लग्न झाले होते. कौटुंबिक कारणांवरून त्यांच्यात वाद सुरू होते आणि ते एक महिन्यापासून विभक्त राहत होते. विनायक भवारी वारंवार घरी ये-जा करत असल्याने मयत मंगल शिंदे त्याला जाब विचारत होत्या. तसेच, मुलगी धनश्री देखील त्याला घरी येऊ नको असे सांगत होती. या रागातून आरोपीने तक्रारदार महिलेच्या घरी येऊन मंगल शिंदे यांची हत्या केली. मंगल शिंदे यांची हत्या करत असताना अल्पवयीन धनश्रीने आरडाओरड केली. त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने तिचाही गळा आवळून खून केला.या दुहेरी हत्याकांडाचा पुढील तपास आळंदी पोलिस करत आहेत.
पुणे विद्यापीठात माहिती अधिकारी पदासाठी कंत्राटी भरती करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी यासंदर्भात राज्य माहिती आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, यामुळे माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कुंभार यांच्या तक्रारीनुसार, माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 5(1) नुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने आपल्या विद्यमान अधिकाऱ्यांमधूनच माहिती अधिकारी नियुक्त करणे बंधनकारक आहे. मात्र, विद्यापीठाने कंत्राटी स्वरूपात भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करून या तरतुदीचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'डेझीगनेट' या शब्दाचा अर्थ स्पष्ट असून, ही जबाबदारी संस्थेतील अधिकाऱ्यालाच देणे अपेक्षित असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या संदर्भात केंद्रीय माहिती आयोगाच्या विविध निर्णयांचाही उल्लेख करण्यात आला आहे. आर.के. जैन विरुद्ध मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आणि सुभाष चंद्र आगरवाल विरुद्ध कॅबिनेट सेक्रेटरीएट या प्रकरणांमध्ये माहिती अधिकारी हा संस्थेतील जबाबदार अधिकारी असावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच जे.पी. अग्रवाल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरणात माहिती अधिकाऱ्याची जबाबदारी वैयक्तिक व हस्तांतरण न करता येणारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तक्रारीत असेही म्हटले आहे की, कंत्राटी माहिती अधिकारी नेमल्यास पारदर्शकता व उत्तरदायित्व या मूलभूत तत्त्वांना धक्का लागतो. कंत्राटी व्यक्तीकडे आवश्यक वैधानिक अधिकार नसतात आणि त्याला प्रभावीपणे जबाबदार धरता येत नाही. त्यामुळे अशा नियुक्त्या कायद्याच्या मूळ उद्देशालाच बाधा आणतात. विजय कुंभार यांनी महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाकडे कलम 18 अंतर्गत चौकशीची मागणी केली आहे. तसेच संबंधित भरती प्रक्रिया बेकायदेशीर घोषित करून विद्यापीठाला नियमित अधिकाऱ्यामधून माहिती अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ही बाब केवळ एका संस्थेपुरती मर्यादित नसून, संपूर्ण प्रशासनातील उत्तरदायित्वाशी संबंधित असल्याने तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
बीड न्यायालयाने सतीश उर्फ खोक्या भोसले याला हत्येचा प्रयत्न प्रकरणात निर्दोष ठरवून मोठा दिलासा दिला आहे. एक वर्ष कारागृहात राहिल्यानंतर त्याची सुटका झाली असून या निर्णयामुळे जिल्ह्यात चर्चा रंगल्या आहेत. न्याय देवतेने मला न्याय दिला, असे म्हणत त्याने दिलासा व्यक्त केला. तसेच, मला जाणीवपूर्वक संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका नेत्याला लक्ष्य करण्यासाठी आदिवासी समाजातील मला टार्गेट करण्यात आले, असेही त्याने म्हटले आहे. सुमारे वर्षभरापूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर ढाकणे पिता-पुत्रावर हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी त्याला अटक करून छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात ठेवले होते. दीर्घ सुनावणीनंतर बीड न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे भोसले याला या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर काल त्याची अधिकृत सुटका झाली आणि आज तो कारागृहाबाहेर आला. दरम्यान, भोसले याच्याशी संबंधित आणखी एक प्रकरणही चर्चेत आहे. एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा त्याचा व्हिडिओ काही काळापूर्वी व्हायरल झाला होता. या घटनेप्रकरणी त्याच्यावर वेगळा गुन्हा दाखल असून तो सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्या प्रकरणात भोसलेला जामीन मिळालेला आहे. त्यामुळे हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपातून मुक्तता मिळाली असली तरी इतर प्रकरणांमुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरूच आहे. काही लोक वातावरण बिघडवत असल्याचा आरोप न्यायालयाच्या निर्णयानंतर भोसलेने माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. न्याय देवतेने मला न्याय दिला, असे म्हणत त्याने दिलासा व्यक्त केला. तसेच, मला जाणीवपूर्वक संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका नेत्याला लक्ष्य करण्यासाठी आदिवासी समाजातील मला टार्गेट करण्यात आले, असा आरोपही त्याने केला. पुढे बोलताना त्याने कुटुंबावर तीन वेळा हल्ले झाल्याचा दावा केला. आयुष्यभराची कमाई लावून उभारलेलं घर पाडण्यात आलं. गेल्या एका वर्षात माझ्या कुटुंबाने खूप त्रास सहन केला, असेही सांगितले. जिल्ह्यातील जातीयवाद आणि राजकीय वैमनस्यामुळे काही लोक वातावरण बिघडवत असल्याचा आरोप करत भोसलेने या प्रकरणाला वेगळं वळण दिलं आहे.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांनी तातडीने या प्रकरणी संवेदना व्यक्त करणे गरजेचे होते. त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली नाही. शेतकऱ्यांना खूप हाल सहन करावे लागत आहेत. जळगावमधील जे लोकं सत्तेत आहे त्यांच्या संवेदना ठार मेलेल्या आहेत, ते 24 तास राजकारण करतात, संकटमोचक गिरीश महाजन शेतकऱ्यांवर संकट आल्यावर कुठे असतात असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, बारामतीमध्ये कौटुंबिक कारणास्तव शरद पवार यांचा पक्ष कदाचित निवडणूक लढणार नाही, पण इतरांना निवडणूक लढवू नये असे सांगू नये. ही लोकशाही आहे, त्यावर एकत्र बसत निर्णय घ्यावा लागेल. मविआतील नेते एकत्र बसून या दोन्ही जागा संदर्भात निर्णय घ्यावा लागेल. शिवसेनेने राहुरीत लढावे असे आमचे कार्यकर्ते सुद्धा म्हणत आहे. भाजपला मदत होईल असे निर्णय घेऊ नये ही आमची भूमिका आहे. महाजन केवळ राजकीय संकटमोचकाचे काम करतात का? संजय राऊत म्हणाले की, संकटमोचन हे केवळ राजकीय संकटमोचकाचे काम करतात का? शेतकऱ्यांवर जेव्हा संकट येतात तेव्हा हे काही काम करताना दिसत नाही. केवळ पक्ष फोडणे, आमदार, नगरसेवक पळवणे हे त्यांचे कर्तव्य आहे का? हे राज्याचे दुर्दैव आहे. जळगाव जिल्ह्यात राजकीय हुकुमशाही संजय राऊत म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात राजकीय हुकुमशाही सुरू आहे. पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी सुरू आहे, पोलिसांनी स्वत:ला वर्दीतील गुंड समजू नये. जळगावमध्ये पोलिस गणवेशातील हुकुमशाही आहे, त्याचा वापर राजकीय विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी करत असतात. हळूहळू तुमचाही जोर ओसरणार आहे. शिंदे गटाचे आमदार हे संकटमोचकाच्या संपर्कात आहेत ते पुढची निवडणूक भजपमधून लढवतील असे वाटते. तिन्ही पक्षाने एकत्र निर्णय घ्यावा संजय राऊत म्हणाले की, राहुरी आणि बारामतीमध्ये पोटनिवडणूक आहे. मविआ म्हणून आपण निर्णय घेतला पाहिजे. राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून चांगल्या प्रकारे ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीवर चर्चा होते, काँग्रेस अनेक ठिकाणी सर्वांत आधी निवडणूक लढवण्यासाठी पुढे जाते निकालानंतर कळते आपण कुठे आहोत. जिथे ज्या पक्षाची ताकद आहे त्याच पक्षाने निवडणूक लढवावी. मविआतील तिन्ही पक्षांनी एकत्र येत निवडणुकीचा विचार केला पाहिजे.
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण:बडतर्फ पीएसआय गोपाळ बदनेला 5 महिन्यांनंतर जामीन मंजूर
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या खळबळजनक आत्महत्या प्रकरणात अडकलेले बडतर्फ पोलfस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला दिलासा मिळाला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कारागृहात असलेल्या बदने याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मंजूर केला. 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि विशिष्ट अटींच्या अधीन राहून न्यायालयाने हा निर्णय दिला. 23 ऑक्टोबर 2025 रोजी फलटणमधील एका हॉटेलमध्ये बीड येथील रहिवासी असलेल्या महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती, ज्यामध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि घरमालक प्रशांत बनकर यांच्याकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाचा उल्लेख केला होता. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. नेमके प्रकरण काय? साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या या डॉक्टरने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. मात्र या मृत्यूमागे केवळ नैराश्य नव्हते, तर एक भयंकर गुन्हा दडलेला असल्याचे समोर आले. आत्महत्येनंतर डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली आढळली. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी स्वतःवर चार वेळा बलात्कार झाल्याचा आरोप निलंबित पीएसआय गोपाल बदनेवर केला. तसेच प्रशांत बनकर यानेही मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख केला. आत्महत्येपूर्वी काही महिन्यांपासून त्या आरोग्य विभाग आणि पोलिसांमधील तणावग्रस्त वातावरणात होत्या, अशी माहिती पुढे आली. वैद्यकीय तपासणीसंबंधी काही वादानंतर त्या चौकशीत सापडल्या होत्या आणि त्यातूनच मानसिक ताण वाढला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. डॉ. संपदा मुंढे यांनी गंभीर मानसिक छळामुळे आत्महत्या केली. याचा महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने तीव्र निषेध करीत या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या महिलांच्या मुद्यावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. फडणवीस सरकारने अचानक मोठ्या संख्येने लाडकी बहीण योजनेतून लाभार्थ्यांची कपात केली. मग एवढे महिने महाराष्ट्राच्या तिजोरीतून गेलेल्या पैशांची भरपाई कोण करणार? असा सवाल ठाकरे गटाने या प्रकरणी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारच्या तिजोरीतील 21 हजार कोटी पाण्यात गेल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर उपरोक्त शब्दांत निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, निवडणुकीच्या काळामध्ये नियोजनशून्य महायुतीने मतांच्या लालसेपोटी पैशांची खैरात केली. योजनेच्या नावाखाली पगारी मतदार मिळवण्याचा प्रयत्न केला. आता अचानक एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यां मध्ये कपात केली. मग इतकी महिने महाराष्ट्राच्या तिजोरीतून गेलेला पैसा याची भरपाई कोण करणार..? एरवी क्रेडिट घेण्यासाठी पुढे येणाऱ्या फडणवीस शिंदे आणि आदिती तटकरे यांच्यापैकी आता कोण हे नुकसान भरून काढणार आहे? असा सवाल सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये पाण्यात गेलेल्या 21 हजार कोटींचा हिशोब कोण देणार? याचे उत्तरही महायुती सरकारकडे मागितले आहे. अपात्र लाभार्थ्यांवरून राजकारण तापणार उल्लेखनीय बाब म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली होती. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. महिला वर्गात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या योजनेचा फायदा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत झाला. त्यांची सलग दुसऱ्यांदा राज्यात सत्ता आली. त्यानंतर सरकारने या योजनेतील बोगस लाभार्थ्यांची छाननी करण्याचा निर्णय घेतला. त्यात हजारो बोगस लाभार्थी निष्पन्न झाले. विशेषतः वार्षिक अडीच लाखांचे उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी ही योजना सुरू असताना त्यात सधन महिला तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले. अखेर सरकारने प्रारंभी या योजनेतून सरकारी कर्मचाऱ्यांना वगळले. त्यानंतर ई केवायसीच्या माध्यमातून इतर बोगस लाभार्थ्यांकडे आपला मोर्चा वळवला. त्यातही हजारो महिला या योजनेतून बाद झाल्या. पण आता याच अपात्र बहिणींच्या विषयावरून राज्याचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
मुंबईत बेकायदा दिवे आणि सायरन लावून फिरणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत 80 वाहनांवरील अवैध साहित्य जप्त केले आहे. मंत्रालय परिसरातच ही कारवाई झाल्याने या प्रकरणाने विशेष लक्ष वेधले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत विशेष मोहीम राबवत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली. मंत्रालय आणि विधानभवन परिसरात मोठ्या प्रमाणावर खासगी वाहनांवर लाल, निळे आणि पिवळे फ्लॅश लाईट्स तसेच सायरन वापरले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासणी मोहीम सुरू केली आणि एकामागून एक वाहनांची तपासणी करत 80 गाड्यांवर कारवाई केली. संबंधित वाहनांवरील सर्व बेकायदा दिवे आणि सायरन जप्त करण्यात आले असून वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. नियमांनुसार, अशा प्रकारचे दिवे आणि सायरन केवळ आपत्कालीन सेवा, कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणा आणि अधिकृत शासकीय वाहनांनाच वापरण्याची परवानगी आहे. मात्र काही वाहनचालक प्रतिष्ठा दाखवण्यासाठी किंवा वाहतुकीत सवलत मिळवण्यासाठी या सुविधा बेकायदेशीररित्या वापरत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या वापरामुळे इतर वाहनचालकांमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि काही वेळा वाहतूक नियम मोडण्यास प्रोत्साहन मिळते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, अशा बेकायदा दिवे आणि सायरनचा वापर करून काही गंभीर गुन्ह्यांमध्येही गैरफायदा घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ वाहतूक नियमभंग म्हणून न पाहता, सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत गंभीर बाब म्हणून पाहिले जात आहे. याच कारणामुळे पोलिसांनी ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. गुन्हा दाखल करण्याचीही कारवाई होऊ शकते दरम्यान, पुढील काळातही अशा नियमभंगावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. बेकायदा दिवे किंवा सायरन आढळल्यास संबंधित वाहनचालकांवर मोठा दंड आकारला जाईल, तसेच वाहनाची नोंदणी रद्द करण्याची शिफारस आरटीओकडे केली जाईल. काही गंभीर प्रकरणांमध्ये थेट गुन्हा दाखल करण्याचीही कारवाई होऊ शकते. नागरिकांनीही जागरूक राहून अशा वाहनांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर मध्यरात्री मोठी कारवाई करत दोन LPG गॅस टँकर जप्त करण्यात आले आहेत. या टँकरमधील गॅस काळ्या बाजारात विकला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काल उशिरा रात्री समृद्धी महामार्गावर तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. दोन टँकर संशयास्पद हालचाली करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मोठ्या प्रमाणावर LPG गॅसचा साठा आढळून आला. हा गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून विक्रीसाठी वापरला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ टँकर ताब्यात घेतले. या प्रकरणाबाबत माहिती देताना विभागाचे अधिकारी चंद्रकांत डांगे यांनी सांगितले की, या टँकरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून काळ्या बाजारात विकला जात होता. एका सिलिंडरची किंमत 5 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत आकारली जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकारामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, यामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी यंत्रणा प्रयत्न करत आहेत. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत….
औंढा तालुक्यातील लाख येथील मधोमती विद्यालयातील एका शिक्षकाकडून 28 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकास निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या निलंबनाचे आदेश शाळा प्रशासनाने नुकतेच काढले आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील मधोमती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाला संपूर्ण वर्षाचा घरभाडे भत्त्या पोटी 58 हजार रुपयांची रक्कम मिळाली होती. मात्र सदर रकमेतून 50 टक्के रक्कम दे असा मुख्याध्यापक संतोष कढणे याने शिक्षकाकडे तगादा लावला होता. सदर रक्कम न दिल्यास मुख्यालयी राहात नसल्याचा अहवाल शिक्षण विभागाकडे पाठविण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यानंतर तडजोड होऊन 28 हजार रुपये देण्याचे ठरले होते. सदर रक्कम घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ता. 5 मार्च रोजी पकडले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचलुचपतचे उपाधिक्षक राजेश मलपिल्लू पुढील तपास करीत आहेत. या संदर्भात लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. त्या अहवालावरून मुख्याध्यापक कढणे यास निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी विपुल भागवत यांनी शाळा प्रशासनाला दिले होते. दरम्यान, लाचलुचपत विभागाचा अहवाल व शिक्षण विभागाच्या आदेशानंतर शाळा प्रशासनाने लाचखोर मुख्याध्यापक संतोष कढणे यास निलंबित केले आहे. त्याच्या निलंबनाचे आदेश नुकतेच काढण्यात आले असून याबाबतचा अहवाल देखील लाचलुचपत विभागाकडे सादर करण्यात आला आहे.
महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून समाजातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांना संधी मिळणे अपेक्षित आहे. मात्र हा मार्ग पराभूत आणि निष्ठावान नेत्यांसाठी वापरला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या अर्जांच्या छानणीत 52 अर्ज वैध ठरले. आता या जागांवर वर्णी लावण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. कायद्यानुसार स्वीकृत सदस्यपदी डॉक्टर, वकील, इंजिनिअर किंवा निवृत्त प्रशासकीय अधिकारी यांची निवड होणे अपेक्षित असते. मात्र, 80 अर्जांपैकी बहुतांश अर्ज हे अशा कार्यकर्त्यांचे आहेत ज्यांना मुख्य निवडणुकीत तिकीट मिळाले नाही किंवा जे निवडणुकीत पराभूत झाले आहेत. विशेष म्हणजे, प्रशासनाकडून 180 जणांनी अर्ज नेले होते, पण प्रत्यक्ष राजकीय गॉडफादरचा पाठिंबा असलेल्या 80 जणांनीच हिंमत दाखवली. राजकीय पुनर्वसनाचे प्रयत्न माजी नगरसेवक गोकूळसिंग मलके, चेतन कांबळे, पूनम बमणे, रूपचंद वाघमारे, गोपाळ कुलकर्णी यासह नेत्यांच्या नातेवाइकांचा सक्रिय राजकारणात प्रवेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. राजकीय पक्षांना अनुभवी हातांपेक्षा निष्ठावंतांच्या पुनर्वसनाचीच जास्त काळजी आहे. तज्ज्ञांना बाजूला सारून जर राजकारण्यांचीच वर्णी लागणार असेल. पुढील आठवड्यात सभा;नावे होणार जाहीर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या नावांवर शिक्कामोर्तब होईल. गटनेते आपली यादी महापौरांना देतील आणि सभागृहात ती वाचून दाखवली जाईल. आता 52 पैकी ते 10 भाग्यवान कोण ठरतात, जे राजकीय पुनर्वसनाच्या या लॉटरीत बाजी मारतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. यांचे पत्ते कट झाले छाननीत 28 अर्ज बाद झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांचा अर्ज बाद झाल्याची चर्चा आहे, संजय केणेकरांच्या चिरंजीवांनी माघार घेतल्याने भाजपमधील एका गटाचा मार्ग सुकर झाला असला तरी, कराड आणि इतर नेत्यांच्या मुलांच्या पात्र अर्जांमुळे चुरस कायम आहे. भाजपमध्ये वेटिंग लांबली भाजपकडे असलेल्या संख्याबळानुसार त्यांच्या वाट्याला 5 जागा येण्याची शक्यता आहे, पण दावा करणाऱ्यांची संख्या 25 च्या पार गेली आहे. बड्या नेत्यांच्या मुलांचे आणि नातेवाइकांचे अर्जपात्र ठरल्याने, सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यावसायिकाच्या टॅबमधील खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाखांची मागणी करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी सापळा रचत चार आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे. नाशिक शहरात गुन्हेगारीचे नवे प्रकार समोर येत असून, एका ज्येष्ठ व्यावसायिकाला लक्ष्य करत खंडणी उकळण्याचा गंभीर प्रयत्न उघडकीस आला आहे. काही दिवसांपूर्वी या व्यावसायिकाच्या कार्यालयातून टॅब चोरीला गेला होता. या टॅबमध्ये त्याच्या एका परिचित महिलेसोबतचे अनेक खासगी व्हिडिओ साठवलेले होते. हा टॅब आरोपींच्या हाती लागल्यानंतर त्यांनी त्या व्हिडिओंचा आधार घेत व्यावसायिकाला धमकावण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, या टॅबमध्ये 200 च्या आसपास खासगी आणि आक्षेपार्ह स्वरूपाचे व्हिडिओ असल्याचा अंदाज आहे. या व्हिडिओंना सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी संबंधित व्यावसायिकाकडे 12 लाख रुपयांची मागणी केली. या धमक्यांमुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर सातपूर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने तात्काळ कारवाई सुरू करत सापळा रचला. खंडणीखोरांनी व्यावसायिकाला पैसे देण्यासाठी ठराविक ठिकाणी बोलावले होते. पोलिसांनी या संधीचा फायदा घेत गुप्तपणे कारवाई केली. आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी चित्रपटाला शोभावा असा पाठलाग करत त्यांना पकडले. 10 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना चार संशयितांना रंगेहाथ अटक करण्यात आली. सध्या सर्व आरोपी पोलिस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. टॅबमध्ये व्हिडिओ असणेही संशयास्पद दरम्यान, या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. टॅबमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ असणे ही बाब संशयास्पद ठरत आहे. त्यामुळे आता पोलिसांचा तपास केवळ आरोपींपुरता मर्यादित न राहता तक्रारदार व्यावसायिकाकडेही वळला आहे. हे व्हिडिओ नेमके कोणाचे आहेत, ते कशा प्रकारे तयार झाले आणि यामागे मोठे रॅकेट आहे का, याचा शोध घेतला जात आहे. एकूणच, अशोक खरात प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या नाशिकमध्ये या नव्या घटनेने खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांची बदली झाल्याचे आदेश गुरुवारी (२ एप्रिल) धडकताच शहराच्या राजकीय वर्तुळात त्यांना थांबवण्यासाठी चर्च सुरू झाली आहे. शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट असताना हा बदल नको, अशी भूमिका मंत्री अतुल सावे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घेतली आहे. या बदलीला स्थगिती आणण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या निर्णायक टप्प्यात आहे. २०० एमएलडी पाणी आणण्यासाठी मुख्य जलवाहिनीची चाचणी सुरू आहे. अशा वेळी नवीन आयुक्त आल्यास कामाची गती मंदावेल, अशी भीती व्यक्त होत आहे. सावेंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती करणार पाणीपुरवठा योजना आणि नवीन कचरा संकलन यंत्रणा मार्गी लागेपर्यंत बदल नको. मंत्री अतुल सावे यांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार. - समीर राजूरकर, महापौर तुम्हीच सांगा, आयुक्त जी. श्रीकांत यांची बदली योग्य आहे की नाही? महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांची बदली करण्यात आली आहे. अधिकाऱ्याची बदली ही प्रशासकीय बाब असली तर आयुक्तांच्या कार्यकाळात पाणीपुरवठा योजनेचे काम पुढे सरकले. या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या बदलीबद्दल आपल्याला काय वाटते. १. महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांच्या बदलीबद्दल तुमचे मत काय ?[A] बदली योग्य आहे [B] बदली अयोग्य आहे २. शहर पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी जी. श्रीकांत यांची गरज आहे का ?[A] होय [B] नाही विनय गौडा जी. सी., नवे जिल्हाधिकारी गौडा हे जुलै २०२२ पासून चंद्रपूर जिल्हाधिकारी होते. त्यापूर्वी नंदुरबार येथे त्यांनी सीईओ म्हणून काम केले आहे. त्यांनी १०० दिवसांच्या कृती आराखड्यात चंद्रपूर जिल्ह्याला पहिल्या क्रमांकावर आणले. जिल्ह्यातील जिवती हा तालुका नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत निवडला गेलेला एकमेव तालुका होता. पीएस मिन्नू नवे जि. प. सीईओ प्रत्येक समस्येचा बारकाईने अभ्यास करणे आणि त्यावर उपाययोजना करणे ही त्यांची बलस्थाने आहेत. वयाच्या २१ व्या वर्षी त्या विवाहबद्ध झाल्या. २३ व्या वर्षी त्या आई झाल्या. वयाच्या ३२ व्या वर्षी आयएसए पद मिळवले. मंठा (जि. जालना) येथे शाळांच्या समस्या होत्या. त्यांनी तब्बल ५ तास बैठक घेतली. सर्व समस्या जाणून घेतल्या. त्यांचा निपटारा केला. अमोल येडगे, नवे मनपा आयुक्त आयएएसच्या २०१४ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. ते कराड तालुक्यातील रहिवासी आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांची कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. कोल्हापूरमध्ये त्यांनी ‘एआय-ऑफिस लेन्स’, ‘कार्यालय कवच’ आणि ‘सेवादूत’ यांसारखे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (एआय) उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. ‘राजकीय’ समन्वयाचा परिणाम जी. श्रीकांत यांचा सत्ताधारी नेत्यांशी असलेला समन्वय हा या मुदतवाढीच्या मागणीमागील मुख्य केंद्रबिंदू असल्याचे बोलले जाते. ५,५०० पेक्षा जास्त अतिक्रमणे हटवताना श्रीकांत यांनी खंबीरपणा दाखवला. तोच खंबीरपणा आगामी काळातही नेत्यांना अपेक्षित आहे. पाणी योजना पूर्ण झाल्यावर त्याचे ‘क्रेडिट’ घेताना प्रशासकासोबत असलेले ट्युनिंग महत्त्वाचे ठरते. पाणीपुरवठा योजनेसह शहरातील रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला होता. या कामांच्या निमित्ताने राजकीय नेत्यांशी ट्युनिंग जुळले होते. त्यामुळे बदली होऊ नये, अशी राजकीय नेत्यांची इच्छा आहे. मुदतवाढीचा घाट कशासाठी? जी. श्रीकांत यांनी निश्चितच मालमत्ता कर वसुली, पाणी प्रश्न, रस्ता रुंदीकरण आणि शहर सौंदर्यीकरणात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र, प्रशासकीय नियमानुसार बदल्या हा शासन प्रक्रियेचा भाग आहे. जेव्हा मंत्री “बदली आम्ही थांबवू’ असे म्हणतात, तेव्हा प्रशासनावर राजकीय वर्चस्व अधिक असल्याचे दिसून येते. पाणी योजना हे एक तांत्रिक काम असून ते कंत्राटदार आणि अभियंत्यांच्या माध्यमातून चालते. केवळ एका अधिकाऱ्याच्या बदलीमुळे योजना ठप्प होईल, हा दावा प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरू शकतो. ही मुदतवाढ खरोखर ‘पाण्यासाठी’ आहे की आपल्या ‘सोयीच्या’ अधिकाऱ्यासाठी, अशीदेखील चर्चा आहे.
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार पक्षाने केला असून, पक्षश्रेष्ठींकडून यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. राज्यातील बारामती आणि राहुरी या महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाने या दोन्ही जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. बारामतीत संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या असून, इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतिम उमेदवार निवडताना पक्ष नेतृत्व काळजीपूर्वक निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. राहुरी मतदारसंघातही उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दोन्ही ठिकाणी उमेदवारांची नावे जाहीर करण्यापूर्वी मित्रपक्षांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप आणि रणनीती यावरही या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. बारामतीसाठी सहा अर्ज तर राहुरीसाठी चार अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच, इच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखतीही पार पडल्या आहेत. येत्या दोन दिवसांत निवडणुकीबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. दोन्ही मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय दरम्यान, आज समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसने दोन्ही मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय निश्चित केला आहे. उमेदवार निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, आज दिवसभरात ती पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर उद्या माध्यमांसमोर अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे बारामती आणि राहुरीतील लढती अधिक रंगतदार होणार असून, राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर आणि काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी आपल्या इतर मान्यवरांसह नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी दोन्ही मतदारसंघातील रेल्वेसंबंधित समस्यांवर प्रकाश टाकला. त्याचवेळी काटोल-वरुड-मोर्शीमार ्गे पुणे जाण्यासाठी नवीन रेल्वे तसेच याच मार्गावरुन मेट्रो सुरु करण्याची मागणी केली आहे. दरम्यान दोन्ही आमदारांनी मांडलेल्या मागण्यांना वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. यावलकर यांनी काटोल, नरखेड, वरुड, मोर्शी, बडनेरा, पुणे या मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला. या भागातील रहिवाशांना सध्या पुणे रेल्वे मार्गाशी थेट जोडणी नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वैष्णव यांनी ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान काटोलचे आमदार ठाकूर यांनीही या प्रस्तावाचे समर्थन केले असून ही रेल्वेगाडी लवकरात लवकर सुरु करावी, अशी मागणी रेटली. यासोबतच प्रवाशांची सोय, सुरक्षितता आणि वेग सुधारण्याच्या उद्देशाने नागपूर-काटोल-नरखेड रेल्वे मार्गावर मेट्रो सुरु करावी, असाही प्रस्ताव यावेळी देण्यात आला. दिल्ली-नागपूर मार्गावरील ढवळापूर येथील जुन्या दगडी पुलाच्या जागी आधुनिक ‘बॉक्स ब्रिज' उभारण्याची आवश्यकताही यावेळी अधोरेखित करण्यात आली. आधीच्या प्रस्तावांनाही दिला यावेळी दिला उजाळा काटोल आणि नरखेड येथील दक्षिण एक्सप्रेसचे थांबे पूर्वीप्रमाणेच सुरू करावे, भुसावळ-नरखेड रेल्वेगाडीचे सातत्य वारंवार मुदतवाढ देण्यापेक्षा कायम राखावे, वर्धा, काटोल, नरखेड मार्गासाठी नवीन जोड रेल्वे मार्ग उभारला जावा आदी मुद्दांबाबत दोन्ही आमदारांनी यापूर्वीच प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. त्या जुन्या प्रस्तावांची आठवण करुन देताच वैष्णव यांनी या सर्व प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद दिला जाणार असून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.
मतदान जनजागृतीतील ‘रिल्सस्टार्स’चा गौरव:अमरावती मनपा सार्वत्रिक निवडणुकीत राबवला होता अनोखा उपक्रम
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात व्यापक मतदार जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच मतदानाचा टक्का वाढविण्याच्या उद्देशाने स्वीप विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांपैकी तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय ठरलेली रिल स्पर्धा ही एक नाविन्यपूर्ण आणि प्रभावी संकल्पना ठरली. दरम्यान, मतदान जनजागृतीमध्ये प्रभावी ठरलेल्या तीन ‘रिलस्टार्स’चा मनपा आयुक्तांच्या हस्ते गुरुवारी (दि. २) गौरव करण्यात आला. डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती करण्याचा उद्देश ठेवून या रिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शहरातील अनेक तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यांनी मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील नागरिकांची भूमिका आणि प्रत्येक मताचे मूल्य यावर आधारित आकर्षक, सर्जनशील आणि संदेशपूर्ण रिल्स तयार केल्या. स्पर्धेत सादर झालेल्या रिल्सपैकी उत्कृष्ट रिल्सची निवड तज्ज्ञ समितीमार्फत करण्यात आली. निवड प्रक्रियेत संदेशाची परिणामकारकता, सर्जनशीलता, सादरीकरणाची पद्धत तसेच जनजागृतीवर होणारा प्रभाव या बाबींचा विचार करण्यात आला. विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यासाठी पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम तसेच शाळा निरीक्षक योगेश पखाले उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. तीघांचा झाला गौरव या स्पर्धेत दीक्षांत हर्षल मनोहरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कार्तिक काळबांडे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. तनुश्री धीरज कडू यांनी तृतीय क्रमांक मिळविला. मतदान जनजागृतीसाठी केलेल्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
‘पेसा’ कायद्यानुसार मेळघाटमध्ये कार्यरत कंत्राटी शिक्षकांचे तीन दिवसापासून सुरू असलेले काम बंद व धरणे आंदोलन आज, गुरुवार, २ एप्रिल रोजी मागे घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांच्यासोबत झालेल्या यशस्वी चर्चेअंती हा क्षण उगवला. सीईओंनी या शिक्षकांना सकारात्मक कारवाईचे लेखी आश्वासन दिले आहे. दरम्यान आंदोलन मागे घेण्यात आल्यामुळे उद्या, शुक्रवारची सुटी वगळता शनिवार, ४ एप्रिलपासून सर्व शिक्षक आपापल्या शाळांवर रुजू होणार आहेत. मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात हे शिक्षक गेल्या काही वर्षांपासून मानधन तत्वावर कंञाटी म्हणून काम करित आहेत. अनुभव आणि वाढते वय या आधारे त्यांनी सेवेत नियमित करण्याची रास्त मागणी केली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे शिफारस करावी, यासाठी हे आंदोलन सुरु करण्यात आले होते. ३० मार्चपासून सुरु झालेल्या या आंदोलनातील रितेश शिंदे, अविनाश उदापुरे, सागर सुर्यवंशी, विशाल हगवणे, राहुल सोनार, मंगेश आठवले, सीमाबानो शाह, प्रियंका चोपडे, सरिता राऊत व दीपक मेमनकर या दहा शिक्षकांनी दुसऱ्या दिवसापासून साखळी उपोषणही सुरु केले होते. या आंदोलनात किशोर वानखडे, स्वाती पोटे, शितल खडसे, प्राजक्ता दातीर, अक्षय गजभिये, सचिन भालकर, संदीप देशकर, राहुल ठाकरे, सुप्रिया गायकवाड, अश्विन मालवे, आशिष इंगळे,शिशीर साबळे, वैशाली थोटे, देविदास उईके, पार्वती पवार, शालिनी बुराडे, मनोज पारीसे, कल्पना गोवारे, पूजा मेहरे, तेजस चहाकर, प्रियंका चोपडे, संजीवनी कुकडे, संजीवनी गायकवाड, निखिल चव्हाण, ज्योती मेश्राम, प्रफुल्ल पवार, उत्कर्षकुमार चिमोटे, पूजा सिडाम, संदीप राठोडआदी सहभागी झाले होते. तीन दिवसांच्या काळात या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद अमरावती, शिक्षक भारती अमरावती, सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद शाळा व शिक्षण वाचवा अभियान, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना आदी संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तर खुद्द खासदार बळवंतराव वानखडे, अचलपुरचे आमदार प्रवीण तायडे, धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड, शिवसेना नेत्या प्रिती बंड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी यांनीही सीईओंना पत्र पाठवून आंदोलनाचा समेट घडवण्याची सूचना केली.
महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहरातील झोन क्रमांक १ आणि ५ मध्ये मागील दोन दिवसांपासून साफसफाई आणि कचरा संकलनाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. या गंभीर प्रकारामुळे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ‘कोणार्क कंपनी’ आणि मनपा प्रशासन यांच्यातील संशयास्पद संगनमतामुळेच शहराची स्वच्छता व्यवस्था कोलमडल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे. या गंभीर समस्येबाबत गुरुवारी (दि. २) काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी विरोधी पक्षनेते विलास इंगोले, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे, नगरसेवक धीरज हिवसे आणि नगरसेविका राजश्री जठाळे यांनी प्रशासनाच्या ढिसाळ धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला. काँग्रेस नेत्यांनी आरोप केला की, प्रशासनाने नवीन कंत्राट देताना अत्यंत अपारदर्शक पद्धतीचा अवलंब केला आहे. यंत्रणा पूर्णपणे सज्ज नसतानाही कोणार्क कंपनीला काम देणे अडचणीचे झाले आहे. काँग्रेस पक्षाने प्रशासनाला ३ एप्रिल २०२६ पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत स्वच्छता व्यवस्था सुरळीत झाली नाही, तर होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी मनपा प्रशासन आणि कोणार्क कंपनीची असेल. प्रशासनाने आपली जबाबदारी ओळखून कोणार्क कंपनीवर त्वरित कारवाई करावी. पर्यायी व्यवस्था उभी करावी. अन्यथा काँग्रेस पक्ष अत्यंत आक्रमक आंदोलन करेल. असा सज्जड इशारा देण्यात आला आहे. शहरातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मनपा प्रशासनाविरोधात काँग्रेस पक्ष आता गप्प बसणार नाही. हे स्पष्ट करण्यात आले आहे. असेही काँग्रेस नगरसेवकांनी सांगितले आहे. शहराच्या स्वच्छतेचा कंत्राट घेतलेल्या कोणार्क कंपनीने अमरावतीकरांची एकप्रकारे थट्टा चालवली आहे. दोन दिवसांपासून दहापेक्षा अधिक प्रभागांतील सफाई कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे शहरात कचऱ्याचा डोंगर साचला आहे. विशेष म्हणजे, कोणार्क कंपनीसमोर मनपा प्रशासन हतबल असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया काँग्रेससह इतर पक्षांतील काही नगरसेवकांकडून समोर येत आहेत. मोठा गाजावाजा करून या ‘कोणार्क’ कंपनीला तब्बल सात वर्षांसाठी कोट्यवधींचे कंत्राट दिले. ती कंपनी सुरुवातीलाच संकटकाळात मनुष्यबळाची पर्यायी व्यवस्थाही उभी करू शकली नाही. कामगार संपावर गेल्यावर पर्यायी मनुष्यबळ किंवा भांडवल वापरून स्वच्छता राखणे कंपनीचे कर्तव्य होते. मात्र प्रत्यक्षात ही कंपनी तसे करू न शकल्यामुळे नापास ठरत आहे. अतिरिक्त आयुक्तांनी कंपनीच्या असमाधानकारक कामकाजामुळे ५० हजार रुपये दंड ठोठावला असला, तरी अमरावतीकरांना दंडाची रक्कम नको. त्यांना परिसर, शहर, बाजारपेठ स्वच्छ हवे आहेत. कचरामुक्त रस्ते हवे आहेत. अशी अपेक्षा अमरावतीकरांची आहे. ^थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे शहरातील काही प्रभागात दोन दिवसांपासून काम बंद आहे. ही समस्या लवकरच दूर करून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. - डॉ. अजय जाधव, स्वच्छता अधिकारी, मनपा अमरावती. उद्यापासून काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा; पर्यायी व्यवस्था उभी करण्याची मागणी अडचण असल्यामुळे काही प्रभागात काम बंद
गीता नगर सखी मंडळाच्या वतीने महिलांच्या सौभाग्याचे प्रतीक असलेला गणगौर गोठ उत्सव जल्लोषात साजरा केला. सर्व सखींनी ईसर गणगौरचा देखावा काढून सुख, समृद्धी आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना केली. मनीषा वास्कर, शोभा गोळे आणि प्रीती हरणे यांनी टिळा लावून आणि पुष्पवृष्टी करून सर्व सख्यांचे जल्लोषात स्वागत केले. स्नेहल भुतडा आणि कोमल पनपालिया यांनी सर्वांना टेबल खेळ खेळवले. सूत्रसंचालन लक्ष्मी तिवारी व प्रेमा मिश्रा यांनी केले. सरिता बंग यांनी सामूहिक खेळांद्वारे सख्यांना प्रफुल्लित केले तर कल्पना व्यास यांनी मुलांना विविध खेळ खेळवून त्यांचे मन जिंकले. उत्सवात सोळा श्रृंगार आणि नृत्य स्पर्धा घेण्यात आली. सुहानी सिकरिया आणि सोनल सिंघानिया यांनी हाउजी खेळाचे आयोजन केले. प्रमुख पाहुणे म्हणून सरोज अग्रवाल व आशा चितलांगे उपस्थित होत्या. यात सोळा श्रुंगार स्पर्धेच्या परीक्षक म्हणून स्मिता मल्होत्रा आणि मोना कारिया होत्या. नृत्य स्पर्धेच्या परीक्षक हिरल गणात्रा व वृषाली संघई होत्या. डान्स स्पर्धेत प्रथम पुरस्कार रंग ग्रुपच्या तृप्ती अग्रवाल, वैशाली सोनी, कल्पना व्यास, सोनल सिंघानिया यांना द्वितीय पुरस्कार चुडिया ग्रुपच्या जिया राठी, मंजू डागा, सुनयना डागा यांना तर तृतीय पुरस्कार चुनरी ग्रुपच्या लक्ष्मी तिवारी, मंगला तुरकर, पुष्पा यादव यांना प्रोत्साहन पुरस्कार पायल ग्रुपच्या चंचल शर्मा, गायत्री शर्मा आणि सरला खंडेलवाल यांना देण्यात आला. १६ श्रुंगार स्पर्धेत प्रथम चंचल शर्मा, द्वितीय स्नेहल भूतडा, तृतीय लक्ष्मी तिवारी, चतुर्थ गौरी भक्ते ठरल्यात; तसेच चंचल राठी, नेहा साहू, पूनम गांधी, सुहानी सिकरिया, कोमल पनपालिया यांना प्रोत्साहनपर पारितोषिके मिळाली. देवरानी जेठानी स्पर्धेत प्रीती, चंदना विजेत्या देवरानी जेठानी स्पर्धेत प्रीती सिकरिया आणि चंदना लटूरिया विजेत्या ठरल्यात. कॉर्नरमध्ये प्रीती अग्रवाल, कपलमध्ये दीपा अग्रवाल आणि ‘तापमान’ मध्ये सरोज अग्रवाल यांनी बाजी मारली. फुल हाउजीमध्ये प्रथम स्नेहा लदनिया, द्वितीय सविता गांधी, तृतीय धारा राठी, चतुर्थ माया भरगड आणि पाचवी पूजा सिंघानिया विजेत्या ठरल्यात. उत्सवात सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी नृत्य सादर करून जल्लोष केला.
महाराष्ट्र शासनाने नुकतीच दिव्यांग सक्षमीकरण विभाग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंढे यांची बदली केली. सचिव म्हणून कार्यरत असतांना राज्यातील खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळून खोट्या दिव्यांगांना चाप बसला होता. खऱ्या दिव्यांगांच्या नावावर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणारे बोगस दिव्यांग व दिव्यांगाच्या नावावर शासकीय अनुदान लाटणाऱ्या बोगस संस्था प्रमुख यांना पायबंद घातला जात होता. परंतु शासनाने अल्पावधीत त्यांची बदली केल्यामुळे राज्यातील दिव्यांगांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली असून शासन खऱ्या दिव्यांगांवर अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने उभे आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. दिव्यांगांचे हक्क मारणाऱ्या बोगस संस्था आणि त्या संस्थानचे प्रमुख यांना संरक्षण शासनाचे वतीने दिले जात आहे का? या प्रश्नाचे उत्तर कोण देणार. दिव्यांगांना हक्काची जाणीव करून त्यांचे सक्षमीकरण करणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली रद्द करावी आणि त्यांना किमान तीन वर्षे याच विभागात कायम ठेवण्याची आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय बरडे, सचिव मो. अजिज तथा से. नि. दिव्यांग कर्मचारी जिल्हाध्यक्ष दिलीप सरदार, रवींद्र सिरसाट, गणेश अत्तरकर, प्रवीण फुले, ओमप्रकाश बरेठी, उपाध्यक्ष सुभाष पिसे, किशोर वानखडे यांच्यासह समविचारी संघटना राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे अध्यक्ष प्रकाश अवचार, दिव्यांग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष सुधीर कडू, दिव्यांग बेरोजगार संघटना अध्यक्ष श्रीकांत देशमुख, पदाधिकारी माधुरी देठे, उज्वला शर्मा, अनुराधा शेंडे, दीपाली रोठे, वंदना चौधरी,शिल्पा वाघमारे, संगीता पाकदाने, भारती मडावी, ज्योती गाडगे, अर्चना अढाऊ आदींसह दिव्यांग उपस्थित होते.
समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि अकोला, अमरावती व बुलडाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले ‘वारी हनुमान' हे तीर्थक्षेत्र सध्या विदर्भातील भाविकांचे मुख्य श्रद्धास्थान बनले आहे. हे छोटेसे गाव आता आपल्या अध्यात्मिक महतीमुळे ‘वारी हनुमान' या नावाने जगप्रसिद्ध झाले आहे. हनुमान जयंतीनिमित्त हे तीर्थक्षेत्र भाविकांच्या गर्दीने फुलले आहे. येथे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमधील भाविकही येतात. गावाच्या आणि मंदिराच्या विकासात लोकसहभागाचा मोठा वाटा आहे. भाविकांनी दिलेल्या देणग्या, लोकवर्गणी आणि शासनाकडून मिळणारा निधी यांच्या माध्यमातून येथे विकासकामे वेगाने सुरू आहेत. भाविकांसाठी निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि परिसराचे सौंदर्यीकरण यावर भर दिला जात आहे. येथे निसर्गाचा अनमोल चमत्कार पाहायला मिळातो. कारणे येथे बारमाही कोमट पाणी असते. वारी हनुमान येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे पुरातन चमत्कारी गोमुख. हनुमंत दर्शनासाठी वान नदीचा पूल ओलांडताना या गोमुखाचे दर्शन होते. विशेष म्हणजे, या गोमुखातून वर्षानुवर्षे पाण्याचा ओघ सतत सुरू आहे. या कुंडातून येणारे पाणी नेहमी कोमट असते, हे आजही एक न उलगडणारे कोडे आहे. या कुंडाची खोली किती आहे आणि पाण्याचा स्रोत नेमका कोठून येतो, याचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही. भाविक याला हनुमंताचा आशीर्वाद आणि निसर्गाची अनोखी किमया मानतात. या क्षेत्रात केवळ हनुमंताचीच नव्हे, तर प्रभू रामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण यांच्याही अत्यंत देखण्या आणि आकर्षक मूर्ती आहेत. मंदिराचा परिसर निसर्गरम्य असून, भैरवगडच्या कुशीत वसलेले हे स्थान मनाला शांती देणारे आहे. केवळ पर्यटनस्थळ नव्हे हातांना बळ देणारे ऊर्जाकेंद्र ^वारी हनुमान केवळ पर्यटनस्थळ नसून लाखो हातांना बळ देणारे ऊर्जाकेंद्र आहे. येथील कोमट पाण्याचे गोमुख विदर्भाचे वैभव आहे. - डॉ. सतीश वाकोडे, तेल्हारा.
सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुरुवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी नालीतून गॅस काढण्याचा प्रतिकात्मक उपक्रम राबवला. गटारीत शेगडीची नळी लावून प्रतिकात्मकरित्या पेटवला गॅस पेटवून त्यावर चहा केल्याचे भासवले. या अनोख्या आंदोलनाची शहरात दिवसभर चर्चा होती. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारतातही जाणवत असून, गॅस टंचाईची समस्या अधिक तीव्र झाली आहे. शहरी भागात नागरिकांना तब्बल २५ दिवसांनी, तर ग्रामीण भागात ४५ दिवसांनी गॅस सिलिंडर मिळत असल्याचे सांगितले जात आहे. गॅस मिळवण्यासाठी विविध एजन्सीसमोर नागरिकांची मोठी गर्दी होत असून, रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना काम सोडून तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तत्काळ गॅस पुरवठा सुरळीत करावा, तसेच एजन्सीसमोर उभ्या असलेल्या नागरिकांसाठी उन्हापासून संरक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. यावेळी सरकारच्या निषेधार्थ गटारीतून गॅस सिलिंडरमध्ये गॅस भरल्याचा प्रतीकात्मक प्रयत्न करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष देवा गावंडे यांनी सांगितले. या आंदोलनाची चर्चा सुरू होती.
‘आमच्या परिसराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. तो ही जेमतेम एक ते दीडतास. त्यातही अलीकडे गढूळ पाणीपुरवठा होत आहे. वारंवार तक्रारी करुनही निगरगट्ट मनपा पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. आम्हाला नियमित चार दिवसांआड दोन तास पाणी मिळावे, एवढीच माफक अपेक्षा आहे.’ अशा तक्रारी जुने शहरातील शिवसेना वसाहत, गोकर्णा पार्क, अन्नपूर्णा माता मंदिर परिसर, जाजू नगरसह परिसरातील महिलांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना व्यक्त केल्या. असाच काहीशा तक्रारींचा सूर शहराच्या वाढीव वस्ती भागातील मलकापूर, खडकी, शिवणी परिसरातील नागरिकांचा आहे. याबाबत महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग मात्र, याबाबत काहीही कृती करत नसल्याच्या शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. जलवाहिनीच्या विस्ताराचा अभाव, जलकुंभ धुण्याचे काम आदी थातूर मातूर कारणे सांगून महापालिका पाणीपुरवठा विभाग वेळ मारून नेत आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकही या पाणीप्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नागरिकांचा रोष आेढवून घेत आहेत. विरोधी पक्षांचे नगरसेवक आतापर्यंत झालेल्या प्रत्येक सभेत अनियमित आणि गढूळ पाणीपुरवठ्याची समस्या मांडत आहेत. मात्र, मनपा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्षच केल्याने ही समस्या सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीची होत आहे. मलकापूर, शिवणी, गुडधी, उमरी, शिवर, खडकी, खरप, अकोली आदी वाढीव वस्ती परिसरात गेल्या आठवड्यापासून सहा ते सात दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. टाकी पूर्ण क्षमतेने भरली नाही. कधी लिकेज काढायचे आहेत, अशी वेगवेगळी कारणे सांगून पाणी पुरवठ्याचा दिवस एकेक दिवस पुढे सरकवत आता सहाव्या ते सातव्या दिवशी पाणीपुरवठा केला जात आहे. सरासरी दीड तास पाणी पुरवठा हल्ली केला जात आहे. उन्हाळ्यात कुलर सुरू झाल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. मात्र महापालिकेने दोन तासाऐवजी दीड तासांवर पाणीपुरवठा आणला आहे, अशी आेरड प्रामुख्याने मलकापूर, उमरी व गुडधी परिसरातील नागरिकांची आहे. मलकापूर, उमरी, गुडधीत अनियमित पाणीपुरवठा दोन ते अडीच तास पाणीपुरवठा व्हावा ^अन्नपूर्णा माता मंदिरामागील गोकर्णा पार्क परिसरात पाचशे ते साडेपाचशे घरांची वस्ती आहे. या भागात पंधरवड्यापासून नळांना ८ ते १० दिवसांआड तेही गढूळ पाणी येत आहे. पुरवठा आता आठ दिवसांवर गेला आहे. केवळ एक ते दीड तास पाणी मिळते. दोन ते अडीच तास शुद्ध पाणीपुरवठा व्हावा. - प्राजक्ता देशमुख, गृहिणी, गोकर्णा पार्क, जुने शहर. काटेपूर्णात ३७.९०% जलसाठा शिल्लक शहरात गेल्या आठवड्यात ४२ अंशांपर्यंत तापमान गेले होते. उन्हाळ्याच्या प्रारंभीच जिल्ह्यातील लहान मोठ्या २९ धरणातील साठा ४६ टक्क्यांवर आला तर शहरासह ६४ खेडी गावांची तहान भागवणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणात आजच्या स्थितीत २ एप्रिलला ३२.७३ दलघमी म्हणजे ३७.९० टक्केच शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने जिल्ह्यातील धरणांचा साठा वेगाने कमी होत आहे. गेल्या चार दिवसात काटेपूर्णाचा जलसाठा एक टक्क्याने कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचे सावट जाणवणार, अशी चिन्हे एप्रिलच्या प्रारंभीच दिसू लागली आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काढून घेतल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्षांनी केला आहे. हे अधिकार तत्काळ पूर्ववत करण्याची मागणी जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांची समक्ष भेट घेऊन केली आहे. गुरुवारी, दुपारी जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्षांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे आदी उपस्थित होते. नगरपालिकेच्या आर्थिक धोरणावर आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी नमुना क्रमांक ६४ या फॉर्मवर नगराध्यक्षांची स्वाक्षरी असणे अनिवार्य असते. २०१६ ते २०२१ या काळात हे अधिकार नगराध्यक्षांकडे होते आणि त्यांच्या सहीशिवाय चेक (धनादेश) तयार होत नसतं. मात्र, मध्यंतरीच्या काळात नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त असल्याने सर्व निर्णय प्रक्रियेतून लोकसहभाग नाहीसा झाला. आता निवडणुका होऊन लोकनियुक्त प्रतिनिधी सत्तेत आले असतानाही प्रशासकीय अधिकारी नमुना ६४ वर नगराध्यक्षांना स्वाक्षरी करू देत नसल्याचे नगराध्यक्षांचे म्हणने आहे. सध्या ठराव घेणारा, काम करून घेणारा आणि चेकवर सही करणाराही शासन नियुक्त अधिकारीच आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पारदर्शकता संपली असून लोकनियुक्त प्रतिनिधी केवळ नामधारी उरले आहेत. जर हे अधिकार अबाधित ठेवले नाहीत, तर भविष्यात नगराध्यक्ष आणि प्रशासन यांच्यात मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. असे मत रमेश बारसकर यांनी व्यक्त केले.
दक्षिण मुखी मंदिरात बजरंगबलीचा पाळणा:सकाळी विधिवत पूजा, महाभिषेक, लघुरुद्र महाप्रसादाचे केले वाटप
तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहर व परिसरात गुरुवारी सकाळी महापूजा, लघुरुद्र, महाभिषेक, महाप्रसाद अशा धार्मिक कार्यक्रमांसोबत भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हनुमान मंदिर परिसरात भाविकांची भल्या सकाळपासूनच गर्दी झाली होती, तर ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरातही भक्तजनांची रीघ लागली होती. हनुमान जयंतीनिमित्त बहुतांश मंदिरे आकर्षक रोषणाईने सजविण्यात आली. यानिमित्त हनुमान मूर्तीची विधिवत पूजा व हनुमान याग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील दिशा विहार येथील श्री वटवृक्ष दक्षिण मुखी हनुमान मंदिरात वेदमूर्ती गुड्यया स्वामी यांच्या विविध मंत्रोप्चाराने हनुमान जन्मसोहळा( पाळणा ), लघुरुद्र, भजन सेवा आदींचा समावेश होता. पाळणा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती शिंदे, अलका दसले, उज्ज्वला गुरव, चंद्रकला हत्ते, विजयालक्ष्मी कुंभार, श्रीदेवी गुरव, कलावती रोळी, रुपाली कोरे, आरती आळंद, अनिता कुंभार, स्वामी, आदींनी परिश्रम घेतले. शहरातील दिशा विहार येथील श्री वटवृक्ष दक्षिण मुखी हनुमान मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले. या मंडळातर्फे हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला. मधला मारुती येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, सेन्ट्रल चौक हनुमान मंदिर, नवीन राजवाडा चाळ हनुमान मित्रमंडळ व खासबाग गल्ली हनुमान जयंतीनिमित्त हनुमान जन्मोत्सव, सामूहिक हनुमान चालिसा पठण, महाप्रसाद वाटप, दूध वाटप, भक्तिसंगीत असे विविध कार्यक्रम झाले. पागा चाळ आवारातील जुने मारुती मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच मंदिरात दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. शहराप्रमाणे तालुक्यातही हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. गौडगाव, चपळगाव, सलगर, दुधनी, मैंदर्गी, नागणसूर, जेऊर, तडवळ, वागदरी, उडगी, तोलनुर, हंजगी, बादोला व परिसरात हनुमान जयंतीनिमित्त हनुमान मंदिरात शोभायात्रा, महाआरती, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री वटवृक्ष हनुमान मंदिरात महाप्रसाद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख चंद्रकांत दसले, रमेश शिंदे, दिगंबर शिंदे, वेदेश गुरव, माजी सैनिक अनिल हत्ते आदींनी परिश्रम घेतले. शोभायात्रा, महाआरती
कुर्डुवाडी इराण आणि इस्रायलमधील युद्धाची झळ आता थेट गावखेड्यातील घरापर्यंत पोहोचली आहे. बाजारपेठेत याची दाहकता स्पष्टपणे दिसत आहे. व्यावसायिक गॅस बंद झाल्यामुळे छोट्या व्यावसायिकांनी थेट चुली पेटवल्या आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमती वाढल्यामुळे तेल कंपन्यांनी नोंदणीकृत घरगुती गॅस दर स्थिर ठेवले आहेत. पण व्यावसायिक गॅस सिलिंडर माढा तालुक्यात पूर्णपणे बंद केल्यामुळे तालुक्यासह कुर्डुवाडीतील हॉटेल व्यावसायिकांना गॅसला पर्याय शोधावा लागत आहे. काहींनी चुली पेटवल्या आहेत.तर काहींनी हॉटेलमधील पदार्थांमध्ये कपात केली आहे. कुर्डुवाडीतील अहिल्यादेवी बाल उद्यान परिसरातील पावभाजी, वडापाव, फास्ट फूड गाडीवाल्या व्यावसायिकांनी गॅसऐवजी चुलीचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे ग्राहकांना सेवा देताना विलंब होत आहे. राज्य सरकारने गॅस व इंधनबाबत कोणतीच कपात नसल्याचा दावा केला. पण कुर्डुवाडीतील शासन निर्णयाविरुद्ध परिणाम पाहावयास मिळत आहे. यामुळे शहरातील हॉटेल व्यावसायिक आणि खानावळींना चंगलाच फटका बसला आहे. परिणामी येणाऱ्या काही दिवसात हॉटेलमधील जेवण आणि बाहेरचे खाद्यपदार्थ महाग होण्याची शक्यता आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या मध्यमवर्गीय नागरिक गॅसमुळे दुहेरी संकटात सापडला आहे. आता परिस्थिती आटोक्यात आली असून, शहरी बुकिंग २५ दिवसाचा आणि ग्रामीण भागाचा ४५ दिवसाचा ग्याप ठेवण्यात आला आहे. दि. १२ मार्च रोजी काँग्रेस शहराध्यक्ष फिरोज खान यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनी गॅस टंचाईबाबत निवेदन दिले होते. बुकिंग केल्यानंतर ४५ दिवसांत गॅस स्टोव्ह, इंडक्शनला मागणी वाढली माढा तालुक्यामध्ये सध्या नागरिक गॅस टंचाईबाबत भयभीत होऊन नंबर लावण्यासाठी ऑनलाइन गडबड करत होते. नियमित गॅसपुरवठा एजन्सीकडून बुकिंग करताच एका तासात गॅस मिळत होता. पण गॅस टंचाईच्या अफ़वामुळे गॅस बुकिंग केल्यानंतर तीन दिवसावरून आता थेट २५ दिवसांनी शहरी आणि ग्रामीणमध्ये ४५ दिवसांत ग्राहकांपर्यंत पोहोचणार असल्यामुळे नागरिक अन्य स्त्रोताकडे वळत आहेत. यामुळे पुन्हा चूल, स्टो, इंडक्शन यांची मागणी बाजारात वाढत आहे. हॉटेलमध्ये घरगुती गॅस आढळल्यास कारवाई तालुक्यात ७ गॅस एजन्सी एकूण ९१,४९४ घरगुती तर १,२४९ व्यावसायिक ग्राहक सध्या व्यावसायिक गॅस वितरण पूर्णपणे बंद असल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना गॅसऐवजी चुलीचा वापर करावा लागत आहे. माढा तालुक्यात एचपी भारत गॅस आणि इंडेन गॅसचे एकूण ९१,४९४ घरगुती ग्राहक आहेत. त्याचबरोबर व्यावसायिक ग्राहक १,२४९ असून, सात गॅस एजन्सी गॅस वितरण व्यवस्था सांभाळतात. तालुक्यात एक एचपी गॅस एजन्सीचे १६,१७८ घरगुती, एचपी व्यावसायिक ग्राहक आहेत. तर भारत गॅस कंपनीचे चार एजन्सी असून ६२ हजार २९४ घरगुती आणि ९२८ व्यावसायिक ग्राहक आहेत. दोन इंडेन गॅस एजन्सीचे १२,३४२ तर १०५ व्यावसायिक ग्राहक आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये घरगुती गॅस टाकी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तालुक्यात भारारी पथके नेमली असून, स्वतः तालुका पुरवठा अधिकारी पवार यांच्यासह अन्य अधिकारी यावर लक्ष ठेवून असतील.
माढा लोकसभा मतदारसंघातील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी लोकसभेत आवाज उठवत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. मतदारसंघातील रखडलेले जगजीवन मिशनची कामे व दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. मतदारसंघात ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा उल्लेख करत, ही कामे तातडीने पूर्ण करा. तसेच माढा मतदारसंघात जलसंधारण व भूजल पुनर्भरणासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली. लोकसभेतील चर्चे दरम्यान बोलताना खा. मोहिते-पाटील यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे भीषण वास्तव मांडले. टंचाईग्रस्त भागांना प्राधान्य कधी दिले जाणार, याबाबतही त्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. माढा मतदारसंघातील नागरिकांना पाणीटंचाई पासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्यामुळे शेती आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. तात्पुरत्या उपायांऐवजी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक असल्याचे सांगत, जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणासाठी विशेष मोहीम हाती घेण्यासाठी लक्ष वेधले. दुष्काळी, टंचाईग्रस्तांना प्राधान्य देण्याची मागणी भविष्यातील दुष्काळ टाळण्यासाठी केंद्र सरकारकडे नेमका कोणता कृती आराखडा आहे. तसेच टंचाईग्रस्त भागांना प्राधान्य कधी दिले जाणार, याबाबतही त्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. माढा मतदारसंघातील नागरिकांना पाणीटंचाई पासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या नियोजित पाच मजली महाप्रसादगृहाचे काम प्रगतिपथावर असून, त्या कामाची प्रत्यक्ष पाहणी शुक्रवारी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्याकडून करण्यात आली. वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे. ही इमारत वातानुकुलित असून, बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरस फुट आहे. टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर मूर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या नवीन नियोजित महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था आहे. या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स, आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यावेळी मंडळाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, सचिव श्यामराव मोरे, ओंकारेश्वर उटगे, प्रशांत खेडकर, योगेश अहंकारी, अमित थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती. श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर मूर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या नवीन नियोजित महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था आहे.
शहरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त पारंपरिक कावड मिरवणूक काढली. यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले. श्रीराम मंदिर परिसरातील हनुमान मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे श्रीराम मंदिरात भाविकांनी हनुमान चालिसा पठण केली. यावेळी ‘बोल बजरंग बली की जय’ आणि ‘जय हनुमान'च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. श्रीराम मंदिर, अहिल्यादेवी चौक, गणेश चौक, पाटील गल्ली, शिंपी गल्ली, टिळकरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बाजारपेठमार्गे कावड यात्रा काढण्यात आली. नांदूरमधमेश्वर येथील गोदावरी नदीतून भाविकांनी आणलेल्या पवित्र जलाने हनुमान मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला. किल्ला परिसरात महिलांनी कावडधारकांचे विधीवत पूजन केले. याप्रसंगी श्रीराम मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, हनुमान भक्तमंडळ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरातील हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. उत्सवानंतर सायंकाळी येथे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. लासलगाव शहरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त कावड मिरवणुकीत सहभागी झालेले भाविक. संत नामदेव मंदिरात सोहळा शहरातील श्री संत नामदेव मंदिरातही पहाटे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. यानिमित्त ऋषी टापसे यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष मोहित बकरे, अरविंद टापसे, अनिल बकरे, अशोक क्षीरसागर, सुधीर झांबरे समाजबांधव उपस्थित होते.
बालविवाह रोखण्यासाठी समुपदेशन गरजेचे:चांदवड न्यायालयामध्ये अॅड. संग्राम थोरात यांचे प्रतिपादन
बालविवाह मुळापासून रोखण्यासाठी केवळ कायदा पुरेसा नाही, तर पालकांचे समुपदेशन आणि सामाजिक स्तरावर मोठी जनजागृती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अॅड. संग्राम थोरात यांनी केले. तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक प्रबोधन शिबिरात ते बोलत होते. यावेळी बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी आणि शिक्षेबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस. एस. छल्लाणी होते, तर सहदिवाणी न्यायाधीश व्ही. डी. सुंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅड. थोरात यांनी १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलगी आणि २१ वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा यांचा विवाह लावणे हा गंभीर गुन्हा आहे. असा विवाह ठरवणारे, लग्न लावणारे आणि लग्नाला उपस्थित असणारे सर्वजण या कायद्यांतर्गत गुन्हेगार ठरतात. यात दोन वर्षांची शिक्षा किंवा एक लाख रुपये दंडाची तरतूद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. भैय्यासाहेब पटेल यांनी शिबिराच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. शिबिराचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अॅड. पंकज काळे यांनी केले. या शिबिरास चांदवड वकील संघाचे सदस्य, महिला व पुरुष पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकअदालतीचे महत्त्व याप्रसंगी न्यायाधीश एस. एस. छल्लाणी यांनी 'वैकल्पिक वाद निवारण पद्धती' यावर मार्गदर्शन केले. मध्यस्थी केंद्राच्या माध्यमातून वाद मिटवल्यास पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचतो, असे सांगून त्यांनी दि. ८ एप्रिल रोजी चांदवड न्यायालयात आयोजित 'फिरत्या लोकअदालतीत' जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटविण्याचे आवाहन केले.
येथील श्री रेणुका देवी मंदिरात चैत्रोत्सवानिमित्त गुरुवारी (दि.२) श्रींच्या मुखवट्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘आई राजा उदो उदो'च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. रंगमहालातून पालखीने मंदिरात आणलेले हे मुखवटे विधीवत पूजेनंतर देवीच्या मूर्तीवर चढविण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. चैत्र पौर्णिमेनिमित्त पहाटे ५ वाजता नितीन चांदवडकर व नाना सानप यांच्या हस्ते श्री रेणुका मातेचा महाअभिषेक व महापूजा करण्यात आली. उत्सवानिमित्त देवीला पैठणी परिधान करून गाभारा फुलांनी सजविण्यात आला होता. दुपारी १२ वाजता नैवेद्य आरती आणि सायंकाळी ७: ३० वाजता महाआरती पार पडली. यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे व्यवस्थापक एम. के. पवार, सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहित हरेंद्र वैद्य, अमोल कुलकर्णी, विजय जोशी आदींसह श्री रेणुका देवी सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रांगांचे योग्य नियोजन करण्यात आल्याने दर्शन व्यवस्था अतिशय सुलभ व शिस्तबद्ध झाली होती. तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने भाविकांसाठी थंड पाणी आणि महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास झालेल्या भजनाच्या कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर आणि कळसावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाने मोठा शामियाना उभारला होता. यावेळी भाविकांना नितीन चांदवडकर व नाना सानप यांच्यातर्फे बुंदी-मसालेभात, साबुदाणा खिचडी आणि केळीचे वाटप करण्यात आले. तसेच मोनू अग्रवाल व पप्पू भालेराव यांनी मठ्ठा वाटप केले, तर श्री महावीर जैन सेवा केंद्रातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
व्यावसायिक गॅस सिलिंडर त्वरित उपलब्ध करून द्या:मनमाड येथील हॉटेल चालकांची मागणी
शहरात कमर्शियल गॅस सिलेंडरची मोठी टंचाई निर्माण झाली असून, यामुळे हॉटेल, केटरिंग आणि खाद्यपेय व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गॅस अभावी व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यक्त करत, शासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. गॅस मिळत नसल्याने अनेकांना लाकूड, डिझेल व इलेक्ट्रिक भट्ट्यांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. याचा थेट परिणाम खाद्यपदार्थांच्या चवीवर आणि उत्पादन खर्चावर होत असल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली. या प्रश्नी तहसीलदार तसेच तलाठी विशाखा गोसावी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात करण्यात आले. तसेच आमदार सुहास कांदे यांनी या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. या बैठकीस शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, फुले-शाहू-आंबेडकर मंचचे फिरोज शेख, गुरुदीप सिंग कांत, रेवाशेठ मोटवानी, नितीन पाटील आदींसह शहरातील हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. असोसिएशनची स्थापना यावेळी मनमाड शहरातील हॉटेल व खाद्यपेय व्यावसायिकांची नवी संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्षपदी आशिष भंडारी तर सचिवपदी हेमंत गांगुर्डे यांची निवड करण्यात आली.
अहिंसेचा मार्गच जगाला तारक:उमराणे येथे विचारसभेत आमदार राहुल आहेर यांचे प्रतिपादन
सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात भगवान महावीरांनी दिलेला अहिंसेचा मार्गच जगासाठी तारक आहे. जैन समाज हा समाजात दुधात साखरेसारखा मिसळला असून, ज्या-ज्या ठिकाणी हा समाज व्यापाराच्या निमित्ताने गेला, तिथे त्यांनी समृद्धी आणली आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. उमराणे येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त आयोजित विचारसभेत ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते. महोत्सवाच्या प्रारंभी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची सजवलेल्या रथातून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत जैन बांधवांनी अहिंसा परमो धर्म की जय, भगवान महावीर की जय, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मिरवणुकीनंतर जैन स्थानकात संघपती शांतीलाल मोदी यांच्या अध्यक्षतेखाली विचारसभा झाली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांनी भगवान महावीरांची अहिंसा परमो धर्म, क्षमा विरस्य भूषणम्, ही तत्त्वे जगाला सुख-शांती देणारी असल्याचे सांगितले. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे यांनीही महावीरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी संघपती शांतीलाल मोदी, माजी सभापती विलास काका देवरे, सभापती देवानंद वाघ, दीपक निकम, सचिन देवरे आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदापाठोपाठ आता विषय समिती सभापती निवडीतही भाजपने आपला राजकीय वरचष्मा सिद्ध केला आहे. बहुमताचे गणित अत्यंत चतुराईने जुळवल्यामुळे सभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यामध्ये भाजपने आपल्या दोन महिला सदस्यांसह मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि सचिन गरड या अपक्ष समर्थकाला संधी देऊन सत्तेचे समतोल राखला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना आणि उबाठाचे सदस्य गैरहजर राहिले. सभापतिपदी भाजपच्या मीनाक्षी पवार आणि अनिता मोटे यांची निवड झाली आहे. तसेच सत्तेला सुरुंग लागू नये म्हणून भाजपने शब्द दिल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) बालाजी सोनटक्के यांनाही सभापती पद दिले आहे. विशेष म्हणजे भाजप पुरस्कृत अपक्ष सदस्य सचिन गरड यांनाही या सत्तेत वाटा मिळाला आहे. पक्षीय बलाबल - एकूण जागा ६३ {भाजप - २३ {शिवसेना - २१ { उबाठा - ०९ {राष्ट्रवादी अजित पवार - ०४ {राष्ट्रवादी शरद पवार - ०१ { प्रहार - १ {काँग्रेस - ०१ (भाजपमध्ये प्रवेश) { इतर - ०३ विरोधकांची ऐनवेळी माघार महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील डोणगावकर आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून गीतांजली वरुण पाथ्रीकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले होते. मात्र, भाजपचे भक्कम संख्याबळ आणि अपक्षांची मिळालेली साथ पाहून विरोधकांनी निर्धारित वेळेत अर्ज दाखल केले नाहीत. परिणामी, निवडणूक बिनविरोध झाली. पीठासीन अधिकारी यांनी सर्व ३१ उपस्थित सदस्यांच्या सह्या घेतल्या. त्यानंतर दाखल अर्जांपैकी मीनाक्षी पवार यांची महिला बालविकास सभापतिपदी तर बालाजी सोनटक्के यांची समाज कल्याण सभापतिपदी निवड झाली आहे. उर्वरित दोघांना सर्वसाधारण सभेत पद वाटप करण्यात येणार आहे. १ खासदार, ६ आमदार तरी शिवसेना जिल्हा परिषदेत विरोधी पक्षात : कालपर्यंत दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजपला रोखण्यासाठी ‘फील्डिंग' लावत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपची रणनीती शिवसेनेवर भारी पडली. १ खासदार आणि ६ आमदार असूनही शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. येत्या काळामध्ये शिवसेना विरोधी पक्षात बसणार आहे. या विजयामुळे ग्रामीण भागातील भाजपची पकड अधिक घट्ट झाली असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे. जिल्हा परिषदेत सभापती निवडणूक पार पडली. या वेळी विविध मान्यवर.
खुलताबाद भद्रा मारुती हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास अत्यंत भक्तिभावाने व धार्मिक विधींनी महापूजा, अभिषेक व महाआरती पार पडली. मंदिर परिसरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती. यंदा सहा लाखांच्या वर भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी सुमारे पाच लाख भाविकांनी दर्शन घेतले होते, अशी माहिती माहिती भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू बारगळ, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी दिव्य मराठीला दिली. संस्थानतर्फे महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत महाप्रसादाचा लाभ घेतला. यंदा ११ क्विंटल मसाले भात, १३ क्विंटल बुंदी असा २४ क्विंटल महाप्रसाद वाटण्यात आला. मंदिरात मंत्री अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू बारगळ, कचरू बारगळ, रामनाथ बारगळ, योगेश अवचट व राम मोदाळे यांच्या हस्ते विधी पार पडले. सकाळी सहा वाजता हनुमान महाआरती उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. मंदिरात महापूजा, महाआरती करताना पदाधिकारी, दुसऱ्या छायाचित्रात दर्शनासाठी लागलेली भाविकांची रांग. फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पायी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि अन्नदात्यांकडून अनेक ठिकाणी फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. केळी, शाबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू, चहा, शरबत तसेच इतर उपवासाचे पदार्थ भाविकांना मोफत वितरित करण्यात आले. भद्रा मारुती मूर्तीच्या भव्य सजावटीने वेधले लक्ष संदीप मुळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रा मारुती मूर्तीची अत्यंत देखणी व आकर्षक सजावट करण्यात आली होती. झेंडू, गुलाब, मोगरा आदी विविध फुलांच्या आरासेमुळे मूर्ती अधिकच तेजस्वी व दिव्य भासत होती. रंगीबेरंगी फुलांच्या माळा, आकर्षक वस्त्रे तसेच पारंपरिक अलंकारांनी मंदिराचा संपूर्ण परिसर सजवण्यात आला होता.
अवकाळी पावसामुळे दुचाकीच्या चाकात चिखल अडकला होता. रस्त्याच्या कडेला उभे राहून चिखल काढत असताना रस्त्याच्या कामावरील सिमेंट मिक्सर वाहनाने रिव्हर्स घेतला. दुचाकीसह भाऊसाहेब शेजूळ यांना तब्बल ५० फूट ओढत नेले. त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. मुलगी शिवानी गंभीर जखमी झाली. घटना हनुमान जयंतीच्या दिवशी गुरुवारी सकाळी ८ वाजता वैरागड येथील पुलाजवळ घडली. भाऊसाहेब किसनराव शेजूळ (रा. राजुरा, ता. गंगापूर) यांचा मृत्यू झाला. मुलगी शिवानी भाऊसाहेब शेजूळ हिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भाऊसाहेब सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे दूध टाकून आले. त्यानंतर शिवानीला क्लासला सोडण्यासाठी लासुर स्टेशनकडे मोटारसायकल (एमएच २० एफएस ६८६१ वरून निघाले. बुधवारी रात्रीच्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावरील चिखल चाकात गुंतला. त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली. काडीने चिखल काढत होते. गावकरी झाले संतप्त घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी पोहोचले. संताप व्यक्त केला. शिल्लेगाव पोलिसांनी धाव घेतली. भाऊसाहेब यांना गंभीर अवस्थेत लासूर स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी आर्थिक व्यवहार करून जिल्हा परिषद सभापतींच्या निवडणुकीत सदस्यांना तटस्थ राहण्याचे आदेश दिले, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य कृष्णा डोणगावकर यांनी केला आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वीच अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीवेळीही दानवे यांच्यावर १८ कोटींच्या सौदेबाजीचा आरोप झाला होता, त्यापाठोपाठ आता पुन्हा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे २३, शिंदेसेनेचे २१ सदस्य विजयी झाले होते, उबाठाकडे ९ सदस्य होते. सभापती निवडीवेळी शिंदेसेना आणि उबाठाने एकत्र येत भाजपला धक्का देण्याची तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी मातोश्रीचा हवाला देत सदस्यांना तटस्थ राहण्याचे निर्देश दिले. यामुळे संतापलेल्या डोणगावकर यांनी दानवे यांच्यावर थेट हल्ला चढवला. दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतली आणि भाजपला मदत करण्यासाठी हा सर्व बनाव रचला, असा दावा डोणगावकर यांनी केला. पैशाचे आरोप बिनबुडाचे माझी आणि शिंदे यांची बैठक झालेली नाही. आमचे संख्याबळ केवळ ९ असल्याने आमचा अध्यक्ष किंवा सभापती होण्याचा प्रश्नच नव्हता. पक्षप्रमुख ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला गेला. मी केवळ आदेशाचे पालन केले. पैशाचे आरोप आरोप केले त्यांनाच त्याचे पुरावे मागावेत. - अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना उबाठाला मिळणार होते उपाध्यक्ष, सभापतिपद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीवेळी दानवे यांनी सदस्य संजय निकम आणि सोनवणे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना निकम यांनी, दानवे यांनीच आमचा १८ कोटींत शिंदेसेनेसोबत सौदा केला, असा पलटवार केला होता. सभापती निवडणुकीत ठाकरे सेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेसोबत चर्चेमध्ये उद्धवसेनेला उपाध्यक्ष आणि एक सभापतिपद देण्याचे मान्य करण्यात आले होते.
इराणमधील तणाव आणि जागतिक बाजारपेठेतील नफावसुलीमुळे गुरुवारी सोने प्रति तोळा २,१६३ रुपये तर चांदी ६,१८० रुपये किलोने स्वस्त झाली. विक्रमी स्तरावर पोहोचलेल्या सोने-चांदीला आता अमेरिका, इस्रायल- इराण युद्धाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे गुरुवारी बाजार उघडताच पुन्हा मौल्यवान धातूंमध्ये मोठी पडझड झाली आणि सोने १,५३,७७९ तर चांदी २,४७,२०० रुपयांवर स्थिरावली. युद्धात इराण तसेच अमेरिकेच्या आक्रमक भूमिकेमुळे ब्रेंट क्रूडच्या वाढत्या किमती आणि डॉलर इंडेक्समधील तेजीमुळे गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी डॉलरला पसंती दिली, ज्याचा थेट फटका सोने-चांदीच्या दरांना बसला. आदल्या दिवशी १.५५ लाखांवर होते सोनेप्रकार १ एप्रिल २ एप्रिल घसरणसोने (प्रति तोळा) १,५५,९४२ १,५३,७७९ रु. २,१६३ रु.चांदी (प्रति किलो) २,५३,३८० २,४७,२०० रु. ६,१८० रु. युद्धासह विविध कारणांमुळे अस्थिरता आखातातील युद्धाची परिस्थिती आणि जागतिक बँकांचे धोरण यामुळे बाजारात सध्या प्रचंड अस्थिरता आहे. जोपर्यंत पश्चिम आशियातील तणाव निवळत नाही, तोपर्यंत सोन्या-चांदीच्या दरात असेच चढ-उतार पाहायला मिळतील, असे इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे प्रादेशिक उपाध्यक्ष विजयकुमार लष्करे यांनी सांगितले. अमेरिकन डॉलरची मजबुती आणि नफा वसुलीमुळेही बाजारातील अस्थिरता कायम राहिल.
भोंदू अशोक खरातने जगदंबा आणि समता सहकारी पतसंस्थांतून ६० कोटींचे बेनामी व्यवहार केल्याचेपोलिस तपासात पुढे आले आहे. या पतसंस्थांमधील ५७ खात्यांचा नॉमिनी एकटा खरात आहे. या ५७ मध्ये ६ सरकारी अधिकारी, चाकणकर कुटुंबीयांतील दोघांची खाती आहेत. राहाता येथील समता पतसंस्थेत ५७ खातेदारांची तब्बल १०० खाती उघड झाली आहेत. खरातसाठी शिर्डीमध्ये एजंट म्हणून काम करणारा अरविंद बावके याची दोन तर खरात कुटुंबीयांची यात ८ खाती आहेत. मे २०२१ ते जानेवारी २०२६ कालावधीत ही खाती कार्यरत होती. त्यानंतर बहुतांश रक्कम काढून घेण्यात आली. पोलिसांच्या सूचनेनुसार सर्व संबंधित खाती गोठवण्यात (फ्रीझ) आली आहेत, अशी माहिती समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी दिली. ‘तू स्वर्गातील अप्सरा’ म्हणत शोषण; भोंदू अशोक खरातने केला बेकायदा गर्भपात नाशिक | “तू तर स्वर्गातील अप्सरा आहेस. तुझ्या आयुष्यात दोन विवाह ठरलेले होते. तुझा दुसरा आणि खरा पती मीच आहे, तुझ्या मुलांचा सांभाळ मीच करेन, तुझी सर्व संकटे दूर करेन,’ अशा भूलथापा देत भोंदू अशोक खरातने वारंवार शारीरिक अत्याचार केले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने बेकायदा गर्भपात केल्याची तक्रार पीडितेने फिर्यादीत केली आहे. त्या अनुषंगाने संशयित खरात याच्या तपासासाठी ७ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी तपासी पथकाने न्यायालयात केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता ७ दिवसांची म्हणजे ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. कोर्टात होणारी गर्दी व माध्यम प्रतिनिधी, बंदोबस्त लक्षात घेता या गुन्ह्यात खरात यास ऑनलाइन हजर करण्यात आले होते. मुख्य न्यायदंडाधिकारी इचूकराणी यांच्यासमोर ४० मिनिटे ही सुनावणी झाली. पीडिताची ३ वर्षे तक्रार का नाही : खरातचे वकील गुन्ह्याचा कालावधी २०२२ ते २०२५ दाखवला आहे. अत्याचार झाला तर पीडितेने ३ वर्षे तक्रार का केली नाही?खरातची दहशत असल्याने पीडिता पुढे आली नाही. व्हिडिओ व्हायरलप्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. ठराविक व्हिडिओ निवडून ते व्हायरल केले जात आहेत. हा केवळ फसवणुकीचा प्रकार नसून यात तथ्य नाही.आरोपीचे तपासात सहकार्य नाही. लैंगिक शोषणाचे प्रकरण असल्याने चौकशीसाठी ७ दिवस कोठडी मिळावी.पीडिता तीन वर्षे आरोपीला ओळखत होती. या कालावधीत तिने कागदपत्रांबाबत तक्रार का केली नाही?आरोपीने पीडितेच्या आई-वडिलांचे आधार कार्ड घेतले. ते कुठे, कशासाठी वापरले याचा शोध घ्यायचा आहे. फरार पत्नीविरोधात नोटीस शिर्डीतील जमिनीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी खरातची फरार पत्नी कल्पनाविरुद्धपोलिसांनी ‘लुकआऊट’ नोटीस जाहीर केली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता शिर्डीतील प्रतिष्ठित व्यक्ती आणि ईशान्येश्वर मंदिराशी संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचले आहेत. पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहेत. खरातने शिर्डीत मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी केल्याचे समोर येत असून या खरेदीसाठीचा पैसा आणि त्यामागील सावकारी जाळ्याचा पोलिस शोध घेत आहेत.
ईव्हींना ‘समृद्धी’सह प्रमुख महामार्गांवर टोलमाफी:ईव्हींसाठी 10 हजार ते दीड लाखांपर्यंत अनुदान
युद्धामुळे इंधन टंचाई पाहून महाराष्ट्र सरकारने ई-वाहन धोरणांतर्गत २४६ कोटी रुपयांच्या सवलतींचा “बूस्टर डोस’ दिला आहे. दुचाकीसाठी दहा हजार तर चारचाकीसाठी दीड लाखांपर्यंत अनुदान आहे. समृद्धीसह प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना शंभर टक्के टोलमाफी देण्यात आली आहे. यामुळे केवळ प्रदूषणात घट होणार नाही, तर सर्वसामान्यांच्या इंधनावरील खर्चात मोठी बचत होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेला इलेक्ट्रिक वेग मिळणार आहे. शासकीय अनुदानामुळे ई-वाहनांच्या किमती कमी होऊन ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील आणि इंधन खर्चात बचत होईल. सार्वजनिक वाहतूक संस्थांना (बेस्ट,पीएमपीएल इ.) निधी मिळाल्याने शहरांमध्ये प्रदूषणमुक्त, आधुनिक आणि सुखकर ई-बस सेवा उपलब्ध होईल. शेजारी राज्यांत ई-वाहन धोरण ईव्हीसाठी कर सवलतींसह अनुदानाचाही लाभ टोलमाफी: नवीन धोरणानुसार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू (एमटीएचएल) यांसारख्या प्रमुख मार्गांवर ई-वाहनांना (विशेषतः चारचाकी आणि बसेस) १००% टोल माफी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) इतर रस्त्यांवर ५०% सवलतीची तरतूद आहे. आर्थिक सवलती (नोंदणी व रस्ते कर) महाराष्ट्रात नोंदणी होणाऱ्या सर्व ईव्हींना १००% रस्ते कर व नोंदणी शुल्कात पूर्ण सूट मिळते. थेट सबसिडी: नवीन धोरणानुसार ई-दुचाकींसाठी ₹१०,००० पर्यंत, तर ई-चारचाकींसाठी ₹१.५ लाखांपर्यंत थेट अनुदान दिले जाते. २४६ कोटींची तरतूद राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी आम्ही महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२५ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी वितरित केला आहे. २०२६-२७ या वर्षासाठी २४६ कोटींची तरतूद असून यामुळे ई-वाहन क्षेत्राला मोठी चालना मिळेल. -प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, महाराष्ट्र राज्य.
निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत २०२४ च्या मतदार यादीतील प्रत्येक नावाची आता २००२ मधील याद्यांशी ‘मॅपिंग’द्वारे पडताळणी केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५४% काम पूर्ण झाले असून उर्वरित ४६% मतदारांनी पुरावे सादर न केल्यास त्यांचे नाव थेट यादीतून कापले जाण्याची भीती आहे. निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेपूर्वी ‘एसआयआर’ प्रक्रिया राबवली. आता महाराष्ट्रातही ही प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्येक मतदाराची पडताळणी करून यादी दुरुस्त करण्यात येत आहे. मृत, स्थलांतरित मतदार या प्रक्रियेद्वारे वगळले जातील. एकापेक्षा जास्त ठिकाणी असलेली नावेही काढली जातील. या प्रक्रियेत विवाहित महिलांना माहेरचे पुरावे शोधण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. २००२ च्या यादीत ज्यांना नाव सापडणार नाही त्यांना १४ पर्यायी पुरावे बीएलओंना सादर करावे लागतील. दिव्य मराठी एक्सप्लेनर दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर मतदार यादी पुनरीक्षण : शंका आणि समाधान पुनरीक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला नाही तर काय होईल?- बीएलओ घरी येतील, घर बंद असल्यास नोटीस दिली जाईल. तरीही माहिती न दिल्यास नाव यादीतून कमी होऊ शकते.२०२४ चे ओळखपत्र असताना जुने पुरावे का हवेत?- निवडणूक आयोग ‘मॅपिंग’द्वारे २०२४ मधील मतदार हाच २००२ मधील मूळ व्यक्ती आहे का, याची खात्री करत आहे.विवाहित महिलांनी माहेरचे २००२ चे पुरावे कुठून आणायचे?- माहेरच्या गावच्या यादीतील अनुक्रमांक किंवा पालकांचे पुरावे द्यावे लागतील. यासाठी ‘ECINET’ पोर्टल किंवा माहेरच्या बीएलओची मदत घेता येईल.२००२ यादीत नाव नसल्यास काय करावे?- जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जुने रेशन कार्ड आदी १४ पर्यायी पुराव्यांपैकी एक सादर करा.बीएलओ आले तेव्हा मी घरी नसेन तर काय करावे?- बीएलओ पुन्हा संपर्क करतील. वारंवार प्रतिसाद न मिळाल्यास नोटीस देऊन नाव वगळण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.मी २२ वर्षांचा आहे, मग मी २००२ चा पुरावा कसा देऊ?- तुमचे स्वतःचे जन्म प्रमाणपत्र किंवा वडिलांचे/आजोबांचे २००२ च्या यादीतील नाव पुरावा म्हणून द्या.हे पुरावे कुठे जमा करायचे?- तुमच्या भागातील बीएलओकडे द्या किंवा प्रशासनाच्या क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन अपलोड करा.रेशन/आधार चालेल का?- १४ पर्यायी पुराव्यांच्या यादीत रेशन कार्ड व अधिकृत ओळखपत्रांचा समावेश आहे.मी २००२ मध्ये दुसऱ्या जिल्ह्यात होतो, आता इथे स्थायिक झालोय, मग?- जुन्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. ‘Voter Helpline App’ वर जुना तपशील शोधून बीएलओला ऑनलाइन पडताळणीसाठी द्या.पत्ता बदलल्यामुळे माझे नाव ‘दुबार’ ठरवून कमी होईल का?- मतदाराचे नाव एकाच ठिकाणी असावे, यासाठी ही मोहीम आहे.विधवा किंवा अनाथ व्यक्तींकडे जुने पुरावे नसतील तर?- अशा व्यक्ती स्वतःचे १४ पैकी कोणतेही पुरावे देऊ शकतात किंवा पतीच्या मृत्यू दाखला व विवाहाचा पुरावा जोडून मॅपिंग करू शकतात. तुमचे नाव तपासण्यासाठीच्या पाच पायऱ्या 1 Voter Helpline App डाऊनलोड करा.2 मोबाइल नंबर टाकून लॉग इन करा.3 तुमचा EPIC नंबर मतदार क्रमांक टाका.4 माहिती बरोबर Verify करा.5 चूक असल्यास कागदपत्रे लोड करा. यादीत नाव नसल्यास हे १४ पुरावे आवश्यक १. २००२ पूर्वीची मतदार यादी किंवा जुनी निवडणूक पावती २. मालमत्तेची कागदपत्रे, भाडेकरू असल्याच्या नोंदी ३. नागरिकत्व प्रमाणपत्र ४. रहिवासी प्रमाणपत्र ५. निर्वासित नोंदणी प्रमाणपत्र ६. पासपोर्ट ७. एलआयसी पॉलिसी ८.शासनाने दिलेला अधिकृत परवाना/ प्रमाणपत्र ९. शासकीय किंवा निमशासकीय नोकरीचे प्रमाणपत्र १०. बँक किंवा पोस्टाचे पासबुक ११. जन्म प्रमाणपत्र १२. बोर्ड किंवा विद्यापीठाचे शैक्षणिक प्रमाणपत्र १३.कोर्टाच्या नोंदी किंवा कायदेशीर कागदपत्रे १४. रेशन कार्ड, शासकीय ओळखपत्र.
पुणे शहराला गुरुवारी दुपारी तुफानी वाऱ्यासह तासाभरातच १०० मिमी पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार पुण्यात याआधी ४ एप्रिल १८९६ रोजी ५१.१ मिमी पावसाची नोंद झाली होती. गुरुवारच्या पावसाने स्वारगेट बसस्थानक, शिवाजीनगरातील सखल भागांत पाणी साचून वाहतुकीची कोंडी झाली. अनेक वसाहतींतील घरांत पाणी शिरले. ८२ ठिकाणी झाडे पडली. झाड पडून रंजना नवनाथ गिरी (६०) फूल विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, जळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीसह झालेल्या पावसाने २५४१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. याशिवाय सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. येते चार दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्यम महाराष्ट्रात वीज, ढगांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली - ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी महाबळेश्वर येथे सर्वात कमी १७.३. तर अकोला येथे सर्वाधिक ३९.१ अंश तापमान होते. खान्देशात ४०४२ शेतकऱ्यांचे नुकसान जळगाव|जळगाव शहरासह पारोळा, अमळनेर, चोपडा, धरणगाव आणि धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा आणि साक्री पट्ट्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर दोंडाईचात गारा पडल्या. जळगाव जिल्ह्यात दोन दिवसात सहा तालुक्यांमधील सुमारे २५४१.०५ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, ४०४२ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी पारोळ्यातील भोकरबारी, लोणी परिसरात झाडे उन्मळून पडली.
राज्य सरकारने प्रशासकीय कामाला गती देण्यासाठी २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात १० जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व ७ महापालिका व विभाग आयुक्तांचा समावेश आहे. या मोठ्या फेरबदलात छत्रपती संभाजीनगर शहरावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, शहराचे संपूर्ण प्रशासकीय नेतृत्व बदलले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारीपदी आता विनय गौडा जी.सी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर महानगरपालिका आयुक्त म्हणून अमोल येडगे कार्यभार स्वीकारतील. यापूर्वीचे आयुक्त जी. श्रीकांत यांची बदली नवी मुंबईत “जलजीवन मिशन'च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे, तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची अकोला येथे बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे.या बदल्यांमुळे कोल्हापूर, लातूर, नागपूर आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांतील प्रशासकीय समीकरणेही बदलली आहेत. स्थानिक प्रशासनात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी हे फेरबदल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. नवीन नियुक्ती झालेले अधिकारी लवकरच आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. मुंबई | राज्य सरकारने प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी गुरुवारी सनदी अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
राज्यात धुमाकूळ, पुण्यात मुसळधार, पिकांची नासाडी, शेतकरी हवालदिल मुंबई : प्रतिनिधी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने राज्यातील अनेक भागात शेतक-याचे मोठे नुकसान झाले. बीड जिल्ह्यात वीज कोसळून एका शेतक-याचा मृत्यू झाला. पुणे आणि नगर जिल्ह्यात पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे गहू, ज्वारीसह हाता-तोंडाला आलेली रबी पिके, कांदा, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच भाजीपाल्याचीही हानी झाली. […] The post अवकाळीने केली माती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आंध्रात ३५०० केंद्रांवर चक्क पहाटेपर्यंत मतदान!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था २०२४ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या मतदानाबाबत दिल्लीत एका पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत अनेक असामान्य गोष्टी घडल्याचा दावा करण्यात आला. अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी थेट ३५०० मतदान केंद्रांवर चक्क पहाटे २ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. आकडेवारीनुसार एकूण मतदानाच्या सुमारे ४.१६ टक्के मतदान रात्री ११.४५ […] The post आंध्रात ३५०० केंद्रांवर चक्क पहाटेपर्यंत मतदान! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रशासनात मोठे फेरबदल, प्रथमच मोठ्या बदल्या मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने सलग दुस-या दिवशी सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या. आज एका दिवसात तब्बल २५ सनदी अधिका-यांच्या एका फटक्यात बदल्या करून फार मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बदल केले आहेत. एकाच वेळेस २५ सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्याची अलिकडच्या काळातील पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते. छत्रपती संभाजी नगर महापालिका आयुक्त […] The post २५ आयएएस अधिका-यांच्या बदल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्याचे सभापतींचे आश्वासन
लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभा लातूर संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती दयानंद सुरवसे यांना शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठी निवेदन देण्यात आले व त्यांचा संघटनेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष दयानंद बिराजदार यांनी गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या वेतन वाढीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले असता सभापतींनी हा प्रश्न मार्र्गी […] The post वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्याचे सभापतींचे आश्वासन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
२४ गावांतील ३६.६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
रेणापूर : प्रतिनिधी तालुक्यात बुधवारी दि. १ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसामुळे व गारपिटीने रब्बी हंगामातील शेती पिकांचे व फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे . या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार प्रशांत थोरात यांनी दिले आहेत असून २४ गावांतील ६७ शेतक-यांचे एकूण ३६ . ६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका […] The post २४ गावांतील ३६.६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुलाच्या मृत्यूनंतर २४ तासांत वृद्ध आईनेही सोडले प्राण
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील तिरुका येथे एक हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर २४ तासांमध्ये आईनेही आपले प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . जळकोट तालुक्यातील तिरुका येथील लघुउद्योजक गोविंद शिवाजी कराड (वय-५०) हे काही कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. दि ३० मार्च रोजी हृदयविकाराने त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्यावर शोकाकूल […] The post मुलाच्या मृत्यूनंतर २४ तासांत वृद्ध आईनेही सोडले प्राण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अटक टाळणे, ‘मदत’ करण्यासाठी पोलिसांनी घेतली ४५ हजारांची लाच
लातूर : प्रतिनिधी तक्रारदाराच्या मेव्हण्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि ‘मदत’ करण्याच्या बदल्यात ३ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यासंर्भाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. तक्रारदाराकडून ४५ हजार रूपयांची लाच स्विकारताना पोलीस हवालदार राहुल नागरगोजे यास ताब्यात घेतले. तसेच त्यांने उदगीर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांना फोन करून ‘भेट झाली’ अशी […] The post अटक टाळणे, ‘मदत’ करण्यासाठी पोलिसांनी घेतली ४५ हजारांची लाच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रीय सेवा योजनेतून सेवाभाव जोपासा; नेतृत्व घडते
लातूर : प्रतिनिधी ‘विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये सेवावृत्ती जोपासली, तर त्यांच्यातून जबाबदार आणि सजग नागरिक घडतात. विद्यार्थी दशेत नेतृत्वाचे गुण विकसित झाले, तर अशा शिबिरांच्या माध्यमातून समाजाला विविध क्षेत्रांत सक्षम नेतृत्व मिळते. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी नेतृत्वाची पायाभरणी अशा उपक्रमांतूनच होत असते.’ त्यांच्या या विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव […] The post राष्ट्रीय सेवा योजनेतून सेवाभाव जोपासा; नेतृत्व घडते appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जागतिक ऑटिझम दिनानिमित्त लातूर जिल्हा परिषदेत जनजागृती
लातूर : प्रतिनिधी जागतिक ऑटिझम दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा परिषदेत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने गुरुवारी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वमग्नता (ऑटिझम) या विषयावर समाजात व्यापक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रातील समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेतील अधिकारी, […] The post जागतिक ऑटिझम दिनानिमित्त लातूर जिल्हा परिषदेत जनजागृती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ग्रामपंचायतींचा आर्थिक कणा झाला मजबूत
लातूर : योगीराज पिसाळ लातूर जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविले गेले. या अभियान कालावधीत नागरीकांना चालू बाकी पूर्ण व मागील थकीत रक्कमेच्या निम्मी रक्कम भरण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंत सुट मिळाली होती. जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायतीमधील नागरीकांनी मिळालेला सुटचा लाभ घेत चार महिण्यामध्ये २९ कोटी २५ लाख ९५ हजार ६४५ रूपयांची घरपट्टी, नळपट्टीच्या […] The post ग्रामपंचायतींचा आर्थिक कणा झाला मजबूत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत मोठे फेरबदल:24 हून अधिक IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
महाराष्ट्र राज्य शासनाने आज प्रशासकीय स्तरावर मोठा निर्णय घेत भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) एकूण २५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल झाले आहेत. प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमधील प्रशासकीय नेतृत्वात बदल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी हा मोठा फेरबदल मानला जात आहे. येथील महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांची बदली नवी मुंबईत 'जल जीवन मिशन'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली असून, त्यांच्या जागी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे पदभार स्वीकारतील. त्याचप्रमाणे, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (अकोला) येथे रवानगी करण्यात आली असून, त्यांच्या जागी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि नागपूर विभागांतही महत्त्वाच्या नियुक्त्या झाल्या आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे, तर कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी पदी डॉ. विजय राठोड यांची वर्णी लागली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी आता डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यासोबतच, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त पदी श्रीमती संजिता महापात्रा यांची नियुक्ती झाली असून, मावळते आयुक्त सत्यम गांधी यांची बदली अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाजात गती आणण्यासाठी राज्य सरकारने अनेक तरुण अधिकाऱ्यांकडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. यामध्ये श्रीमती मिनू पी.एम. यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या CEO पदी, तर जस्मिन यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची बदली मुंबईत एमआयडीसी (MIDC) च्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी पदी झाली असून, त्यांच्या जागी डॉ. भारत बस्तेवाड हे लातूरचे नवे जिल्हाधिकारी असतील. सर्व बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ आपला नवीन पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागपूरनरखेड तालुक्यातील मालापूर येथे धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावण्याचा प्रयत्न प्रशासनाने उधळला आहे. आठवीत शिक्षण घेणाऱ्या या मुलीचा विवाह तब्बल ३५ वर्षीय पुरुषासोबत करण्यात येत होता. माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत विवाह थांबवून मुलीची सुटका केली. बाल संरक्षण कक्षाकडे या घटनेची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कोंढाळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मुलीला सुरक्षितपणे रेस्क्यू केले. या प्रकरणी नरखेड पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा बालविवाह धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली लपवून पार पाडण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि एक मोठा अनर्थ टळला. या प्रकरणात बालविवाह प्रतिबंध अधिनियम तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा प्रकारच्या विवाहाला पाठिंबा देणाऱ्या आयोजकांवर आणि उपस्थितांवरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाईत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, पोलीस निरीक्षक मंगला मोकाशी, जिल्हा बाल रक्षक समन्वयक प्रसेनजीत गायकवाड आणि चाइल्ड लाईन प्रतिनिधी मीनाक्षी धडाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिला पुढील संरक्षणासाठी बालगृहात दाखल करण्यात येणार आहे. तिच्या पुनर्वसनाबाबतचा निर्णय बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आला आहे.
MIDC उद्योगांना PNG कनेक्शन अनिवार्य:30 जूननंतर सिलिंडर पुरवठा पूर्णपणे बंद होणार
एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. ३० जून २०२६ पूर्वी सर्व औद्योगिक युनिट्सनी पाइपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) कनेक्शन घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. या मुदतीनंतर गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. एमआयए (MIA) चे अध्यक्ष पी. मोहन यांनी उद्योगांना या निर्णयाची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, ही अंतिम मुदत गंभीरपणे घ्या. वेळेत PNG कनेक्शन न घेतल्यास उत्पादन प्रक्रियेवर थेट परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्र शासनाच्या सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनने ही अधिसूचना जारी केली आहे. औद्योगिक वापरासाठी एलपीजीच्या वाढत्या टंचाईमुळे उद्योगांना मोठा फटका बसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या संदर्भात स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, ज्या भागांमध्ये PNG सुविधा उपलब्ध आहे, तेथील सर्व उद्योगांनी ३० जूनपूर्वी कनेक्शनसाठी अर्ज करणे बंधनकारक राहील. ३० जूननंतर औद्योगिक वापरासाठी एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद होईल. या निर्णयाचा परिणाम केवळ उद्योगांवरच नाही, तर कामगारांच्या घरगुती वापरासाठीचे सिलिंडरही बंद होणार आहेत. एमआयडीसी निवासी वसाहतींनाही PNG कडे वळणे अनिवार्य करण्यात आले आहे.
भोसी कॅनलमध्ये भोकर येथील २ युवक वाहून गेले
भोकर : प्रतिनिधी भोकर तालूक्यातील भोसी परिसरात कॅनलमध्ये २ युवक वाहून गेल्याची दुदैर्वी घटना घडली गुरूवारी सायंकाळी ५ वाजता घडली. त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून मोठे प्रयत्न सुरू होते मात्र, या गंभीर परिस्थितीत प्रशासनाकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्राप्त माहितीनुसार, शेख रिजवान शेख शादुल (१७ ) व नुमान बेग […] The post भोसी कॅनलमध्ये भोकर येथील २ युवक वाहून गेले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शाळेच्या नावात दिशाभूल करणारे शब्द वापरण्यास प्रतिबंध
मुंबई : प्रतिनिधी शाळेच्या नावात इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरो यासारखे शब्द वापरून पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करणा-या शिक्षण संस्थांना सरकारने चाप लावला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य मंडळ, केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळा (सीबीएसई) किंवा आंतरदेशीय मंडळांशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थांना त्यांच्या शाळेच्या नावात इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरो यासारखे शब्द वापरण्यास प्रतिबंध केला […] The post शाळेच्या नावात दिशाभूल करणारे शब्द वापरण्यास प्रतिबंध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण, महिला व बालकल्याण तसेच इतर दोन विषय समित्यांच्या सभापती पदासाठी ४ एप्रिल २०२६ रोजी दुसरी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा परिषद इमारतीच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या घटक पक्षाने सावध भूमिका घेत आपली रणनीती स्पष्ट केली आहे. सभापतीपदी महायुतीचे घटक पक्षांना न्याय मिळणार का भारतीय जनता पार्टी त्यांचेच सदस्यांना संधी देणारी याविषयी मोठी उत्सुकता आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर सभापती पदाच्या निवडी शनिवार दि. ४ एप्रिल रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये होत आहेत. मागील राजकीय गोंधळाचा व राड्याचा अनुभव लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जाहीर केले आहेत. हे आदेश शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून सभा संपेपर्यंत लागू राहणार आहेत. आदेशानुसार, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि बंदोबस्तावर नियुक्त पोलीस अधिकारी यांच्याशिवाय इतर कोणालाही या परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महायुतीच्या घटक पक्षांची सावध भूमिका भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपल्या सदस्यांना महाबळेश्वर येथे विशिष्ट ठिकाणी बैठकीच्या निमित्ताने बोलावून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. काही पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता बहुतांश जिल्हा परिषद सदस्य महाबळेश्वर येथील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती आहे. भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी याबाबत बातो बातोमे सुचक इशारा दिला. मात्र या माहितीला अधिकृतपणे दुजेरा देण्यास नकार दिला. भारतीय जनता पार्टीचेच सभापती होतील असा दावा करण्यात आला आहे मात्र प्रदेश कार्यकारणीच्या सूचनेनंतर महायुतीतील मोठा भाऊ असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या साताऱ्यातील नेत्यांनी पुन्हा दोस्तीचा सूर अळवला आहे. कराड उत्तर दक्षिण तसेच पाटण या तीन मतदारसंघातून किमान दोन सभापती पदांवर काही समर्थकांना संधी दिली जाऊ शकते. राष्ट्रवादीचे नेते मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, शिवसेनेचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आक्रमक रणनीती आखली आहे पाच पैकी किमान दोन सभापती पदांवर संधी मिळावी या दृष्टीने राजकीय मोर्चा बांधणी सुरू आहे .शासकीय ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने महायुतीचे सर्व नेतेमंडळी एकत्र आले होते. मात्र त्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सभा होण्यापूर्वी साताऱ्यात महायुतीच्या घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
सरकारी खात्यातील सल्लागारांच्या मनमानी भरतीला चाप
मुंबई : प्रतिनिधी विविध सरकारी खाती, महामंडळे, प्राधिकरणे यात होणा-या आयटी आणि नॉन आयटी सल्लागारांच्या खोगीर भरतीला राज्य सरकारने चाप लावला आहे. प्रत्येक विभागाला आता दोनपेक्षा अधिक आयटी सल्लागार नेमता येणार नाहीत तसेच नॉन आयटी सल्लागार नेमण्यासाठी संबंधित विभाग, महामंडळ, प्राधिकरणाला विहित प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. सरकारच्या विविध विभागात, क्षेत्रीय कार्यालये तसेच महामंडळे आणि […] The post सरकारी खात्यातील सल्लागारांच्या मनमानी भरतीला चाप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
मुंबई : प्रतिनिधी राज्यातल्या काही भागात झालेल्या अवकाळी पावासाचा आणि गारपिटीचा शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. केळी, गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, कलिंगड, भाजीपाला, डाळिंब, कांदा, संत्रा, द्राक्ष तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले. मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यभर मोठे […] The post राज्यातील १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान निवडणूक आयोगाद्वारे राबवण्यात येणाऱ्या 'विशेष पुनरीक्षण मोहिमे'अर्थात SIR संदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन दिले. राज्यात गेल्या 25 वर्षांत मतदारांची संख्या साडेतीन कोटींनी वाढली आहे. 2002-04 मध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 13 महिने दिले होते, त्याच धर्तीवर आताही घाई न करता दीड-दोन वर्षांचा पुरेसा वेळ प्रशासनाने द्यावा. घाईगडबडीत काम केल्यास जनसामान्यांच्या मनात संशयाची भावना निर्माण होऊ शकते. मतदारांचे नाव वगळण्यापूर्वी त्यांना म्हणणे मांडण्यासाठी किमान 7 दिवसांची नोटीस देणे अनिवार्य असावे. तसेच राजकीय पक्षांना या प्रक्रियेची सॉफ्ट कॉपी आणि डेटा उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून प्रक्रियेत पारदर्शकता राहील. बीएलओ स्तरावर कोणत्याही राजकीय दबावाखाली काम होऊ नये तसेच स्थलांतरित, मृत मतदारांची यादी राजकीय पक्षांना वेळेत मिळावी, असे मुद्दे मांडले. ही मोहीम केवळ मतदार नोंदणीपुरतीच मर्यादित असावी, याद्वारे नागरिकत्व सिद्ध करण्याची सक्ती किंवा एनआरसीची मागच्या दाराने अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका मांडली आहे. निवेदनात काय म्हटले आहे? निवेदनात असे म्हटले की, महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांची विशेष पुनरीक्षण मोहीम अर्थात Special Intensive Revision (SIR) राबवण्यात येणार असल्याचे समजते. याबाबत आपण राजकीय पक्षांच्या नेत्यांची एक बैठक मार्च महिन्यात आयोजित केली असल्याचे व त्यात विविध बाबींवर चर्चा झाल्याचे समजते. महाराष्ट्र काँग्रेस हा राज्यातील एक प्रमुख राजकीय पक्ष असून, एस.आय.आर. मोहिमेबाबत आमच्या काही सूचना आणि चिंता असून त्या आम्ही आपणासमोर मांडू इच्छितो. भारतातील काही राज्यांमध्ये अत्यंत गडबडीत तसेच निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक घेतल्या गेलेल्या एस.आय. आर. मोहिमेमुळे प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन सर्वत्र घबराट, साशंकता आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती पक्षाने दिलेल्या निवेदनात दिली आहे. तसेच एकूण 22 महत्त्वाचे मुद्दे देखील या निवेदनात मांडून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्या निदर्शनास आणून दिले आहेत.
परभणी : परभणी जिल्हा परिषद सभापती पदासाठी गुरूवार, दि.२ एप्रिल रोजी निवड प्रक्रीया पार पडली. यात चारही विषय समित्यांच्या सभापतीपदी महिला सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे अध्यक्षासह सभापती व मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त कार्यकारी अधिकारीपदी महिला अधिकारीच विराजमान असल्यामुळे जिल्हा परिषदेत ख-या अर्थाने महिलाराज सुरु झाले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हा. […] The post परभणी जिल्हा परिषदेत महिलाराज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘नक्षत्रांचे देणे’ कवि संमेलनाचे सोमवारी आयोजन
परभणी : न्यायालयीन कर्मचारी साहित्य, कला आणि संस्कृती प्रतिष्ठान परभणीच्या नक्षत्रांचे देणे या समुहाच्या वतीने १० व्या पुष्पातंर्गत जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने सोमवार, दि. ६ एप्रिल रोजी कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कवि संमेलन वसमत रोडवरील सारंग स्वामी विद्यालय जवळील आचार्य नगर मधील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर परिसरात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. […] The post ‘नक्षत्रांचे देणे’ कवि संमेलनाचे सोमवारी आयोजन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर अपघात:गोळेगाव शिवारात भरधाव ॲटो उलटला, 9 गंभीर जखमी
औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर गोळेगाव पाटीजवळ भरधाव ऑटो उलटून झालेल्या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी तारीख दोन घडली आहे. जखमींना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी औंढा नागनाथ येथील आठवडी बाजार असल्याने परिसरातील ग्रामीण भागातील गावकरी आठवडी बाजारसाठी औंढा नागनाथ येथे आले होते. सायंकाळच्या सुमारास हे गावकरी ऑटोने (एम एच ३८ -४६५१) आपापल्या गावी परत जात होते. प्रवासी घेऊन जाणारा ऑटो औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर गोळेगाव शिवारामध्ये आला असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामध्ये ऑटो उलटून रस्त्याच्या खाली खड्ड्यात गेला. या अपघातात परमेश्वर उत्तम नरोटे (वय ३०, रा. धार), सर्जेराव मारोतराव पोले (६०, रा. माथा) परमेश्वर काशीराम कराळे (३५, रा. जांभरून ) मिथुन उत्तम व्यवहारे (रा. मोजा) राजू जालिंदर खंदारे (२७, रा. नागेशवाडी) रेखा राजू सुतारे (४०, रा. माथा) लताबाई विलास मुकाडे (४०, रा. संतुक पिंपरी ) रंजनाबाई राजेंद्र कांबळे (४५, रा. माथा), गंगुबाई प्रभाकर नाईक (३५, रा. राजापूर) हे जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक शेख खुदुस, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, जमादार वसीम पठाण, रविकांत हरकाळ, ओंकारेश्वर रांजणेकर, वसंत चव्हाण, इक्बाल शेख, महामार्ग पोलीस खयामोद्दीन खतीब, राजाराम कदम, प्रमोद थोरात यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना रुग्णवाहिक द्वारे औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून गंभीर जखमी असलेल्या सर्वांनाच पुढील उपचारासाठी हिंगोली व नांदेड येथे पाठविण्याची तयारी ग्रामीण रुग्णालयाने चालवली होती.
हिंगोली जिल्हा नियोजन समितीला मागील आर्थिक वर्षात मिळालेला ३११ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असून ता. ३१ मार्च अखेर १०० टक्के निधी खर्च झाल्याने जिल्हा प्रशासनाचा गतीमानतेचा अनुभव यंत्रणेला आला आहे. या निधीतून मोठ्या संख्येने विकास कामे केली जात आहेत. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यासाठी मागील आर्थिक वर्षात शासनाच्या नियोजन विभागाने ३११ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यातून पालकमंत्री नरहरी झिरवाळ, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजेश नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे यांनी सर्व यंत्रणांकडून विकास कामांचे प्रस्ताव मागवून त्यांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार जिल्हयात विकास कामांना सुरवात झाली आहे. दरम्यान, शासनाकडून प्राप्त झालेला सर्व ३११ कोटी रुपयांचा निधी यंत्रणांना देऊन खर्च करण्यात आला आहे. यामध्ये जलसंधारण विभागाला ६.५० कोटी, पशुसंवर्धन विभाग ९.९२ कोटी, वन विभाग २९ कोटी, शिक्षण विभाग २७ कोटी, आरोग्य विभाग ४४ कोटी, नगर विकास विभाग ४० कोटी, महिला बालकल्याण विभाग ११.६१ कोटी, ऊर्जा विभाग १८.५० कोटी, रस्ते दुरुस्तीसाठी २३.५० कोटी, इमारत बांधकामसाठी १५ कोटी, यात्रा व तिर्थक्षेत्रासाठी ८.५० कोटी, पर्यटन १२ कोटी, पोलिस विभाग ९ कोटी, रस्ते सुरक्षा विभाग १.५० कोटी रुपयांचा निधी वाटप झाला आहे. दरम्यान, नियोजन विभागाने १०० टक्के निधी खर्च झाल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे यांनी स्पष्ट केले. यामध्ये आता विकास कामे सुरु असून चालू आर्थिक वर्षात ३३८ कोटींचा आराखडा असल्याचे त्यांनी सांगितले.
लातूरात परशुराम जयंतीची जोरदार तयारी
लातूर : प्रतिनिधी राजराजेश्वर भगवान परशुराम जन्मोत्सव सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने यंदाही उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या उत्सवात व्याख्यानमाला, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, महिलांसाठी विविध उपक्रम तसेच समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भगवान परशुराम मंदिरात यज्ञयागाचाही विशेष कार्यक्रम होणार आहे. यावर्षी प्रथमच डॉ. संतोष देशपांडे यांची अध्यक्षपदी निवड झाली असून बैठकीत ब्राह्मण सेवा […] The post लातूरात परशुराम जयंतीची जोरदार तयारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हमखास यशासाठी नियोजनाला शिस्तीची जोड हवी
लातूर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम ठरवून त्या दृष्टीने पूढे गेले पाहिजे. प्लॅनिंग करण्यात चुक झाली की, तुम्ही अपयशाचे प्लॅनिंग केले हे लक्षात घ्यावे. एकदा नियोजन ठरले की, त्यात कसलाही बदल झाला नाही पाहिजे. स्वत:चे स्वप्न साकार करा. त्यासाठी नियोजनाला शिस्तीची जोड द्या, यश हमखास मिळते, असा कानमंत्री जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी विद्यार्थ्यांना दिला. […] The post हमखास यशासाठी नियोजनाला शिस्तीची जोड हवी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात पावसाळी लाईन कामांचा हिशेब जाहीर करा:माजी पदाधिकाऱ्यांची मनपा आयुक्तांकडे मागणी
शहरात अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या पार्श्वभूमीवर, गेल्या चार वर्षांत करण्यात आलेल्या पावसाळी लाईन (स्टॉर्म वॉटर ड्रेनेज) कामांचा सविस्तर अहवाल जाहीर करावा, अशी मागणी आपले पुणे आपला परिसर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. नुकत्याच झालेल्या प्रचंड वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश भागांत पाणी तुंबले होते. यामुळे रस्ते, सोसायट्या आणि सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले, ज्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर, पावसाळी लाईनची कामे प्रत्यक्षात किती झाली आणि ती पूर्ण झाली की अर्धवट राहिली, याचा आढावा घेणे आवश्यक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. गेल्या चार वर्षांत या कामांवर सुमारे दीडशे कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. या खर्चाचा तपशील आणि कामांची ठिकाणनिहाय माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे प्रशासनाला कामांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करता येईल आणि आगामी पावसाळ्यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होईल, असे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी संयुक्तपणे सांगितले. या मागणीसोबतच, नगर अभियंता यांना तातडीने या कामांचा सविस्तर आढावा घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही करण्यात आली आहे. हा विषय केवळ आरोप-प्रत्यारोपांचा नसून, शहरातील पावसाळी व्यवस्थापन सुरळीत राहावे हाच या मागणीमागील मुख्य उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर तरी महापालिका प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. शहरातील सर्व नगरसेवक, राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज बाधित नागरिक व्यक्त करत आहेत. पावसाळ्यापूर्वीच ज्या ठिकाणी वारंवार पाणी साचते, त्या ठिकाणांची नोंद घेऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. नालेसफाई, पावसाळी लाईनची दुरुस्ती, अडथळे दूर करणे तसेच जलनिस्सारण व्यवस्थेची क्षमता वाढवणे या कामांना प्राधान्य दिल्यास आगामी पावसाळ्यात अशा समस्या टाळता येऊ शकतात. संबंधित यंत्रणांनी आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय साधून नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास शहराला दिलासा मिळू शकतो.
शहराच्या रिंग रोडवरील अतिक्रमणाचा सर्व्हे होणार
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेतील टाऊन प्लॅनिंग विभागातील अधिका-यांचा भ्रष्टाचार आणि मुजोरीचा फटका थेट लातूर शहराच्या विकासावर होत आहे. अनाधिकृत ले-आऊट टाकुन शहरातील ११० सर्व्हिस रोड गायब करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे या विभागाची उच्चस्तरीय अधिका-यांकडून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात संदर्भाने ‘एकमत’ने वृत्त मालिका सुरु केलेली आहे. त्याची […] The post शहराच्या रिंग रोडवरील अतिक्रमणाचा सर्व्हे होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण पोलिसांनी एका थरारक खून प्रकरणाचा उलगडा केला असून, पाच महिन्यांपूर्वी मुंबईत घडलेल्या या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केली आहे. नोव्हेंबर महिन्यात विशाल खोडदेकर आणि त्याची प्रेयसी जन्नातूनिसा खान यांनी एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि तो चिपळूणमधील रामापूर-आवटेवाडी येथील एका आंब्याच्या बागेत आणून पुरला होता. हा अत्यंत गुप्त असलेला प्रकार पाच महिन्यांनंतर उघडकीस आला असून, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची चक्रे फिरवून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. सध्या न्यायालयाने या दोघांनाही 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून या निर्घृण हत्येचा अधिक तपास पोलिस करत आहेत. चिपळूणमधील रामपूर-आवटेवाडी येथील आंबा बागेत 31 मार्च रोजी जळालेल्या अवस्थेत मानवी हाडे सापडल्याने खळबळ उडाली होती. या गुढ प्रकरणाचा छडा लावण्यात चिपळूण पोलिसांना अवघ्या 24 तासांत यश आले आहे. संशयित आरोपी विशाल खोडदेकर याचा मोबाईल बंद असला तरी त्याचे फेसबुक खाते सुरू होते, ज्याचा आधार घेत पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे त्याला मुंबईतील मालाडमधून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच, पैशांच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादात एजाज कुरेशी याला मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची कबुली खोडदेकरने दिली. मारहाणीत एजाजचा मृत्यू तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विशाल खोडदेकरची प्रेयसी जन्नतुनिसा खान हिने दोन वर्षांपूर्वी एजाज कुरेशीकडून मालाडमध्ये 'हेवी डिपॉझिट' तत्त्वावर घर भाड्याने घेतले होते. या डिपॉझिटच्या पैशांच्या परताव्यावरून जन्नतुनिसाने एजाजकडे तगादा लावला होता. याच वादाचे पर्यावसान हत्येत झाले असून, मारहाणीत एजाजचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह चिपळूणला आणून जाळण्यात आला होता. पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. नेमके प्रकरण काय आहे? मुंबईतील मालाड येथील रहिवासी एजाज कुरेशी यांची आर्थिक व्यवहाराच्या वादातून विशाल खोडदेकर आणि त्याची प्रेयसी जन्नतुनिसा खान यांनी निर्घृण हत्या केली होती. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि विशालच्या गावी असलेल्या आंब्याच्या बागेत फेकून दिला. 15 नोव्हेंबर 2025 रोजी बागेत टाकलेला हा मृतदेह सुटकेसबाहेर पडून अस्ताव्यस्त झाल्याचे लक्षात येताच, विशालने फेब्रुवारी महिन्यात पुन्हा गावी येत डिझेलच्या साहाय्याने मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी मिळालेली मानवी हाडे, एक अंगठी आणि शरीरातील लोखंडी रॉड यांसारख्या पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगवान केली. तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत विशाल खोडदेकर आणि जन्नतुनिसा खान या दोघांना बेड्या ठोकल्या. या धक्कादायक हत्याकांडातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने चांदणी चौक ते भूगाव मार्गाच्या सुमारे २०० कोटी रुपयांच्या पुनर्विकास आराखड्याला सध्या स्थगिती दिली आहे. समितीने प्रशासनाला या प्रकल्पाचा सुधारित फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ७२ (ब) कलमानुसार एवढी मोठी आर्थिक तरतूद करणे कठीण असल्याचे कारण देत हा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, चांदणी चौक ते भूगाव हा मार्ग सध्या तीव्र वाहतूक कोंडीचा प्रमुख केंद्रबिंदू बनला आहे. परिसरातील सध्याची सुमारे ९० हजार लोकसंख्या पुढील काही वर्षांत २ ते ३ लाखांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, त्यामुळे या मार्गाचा तातडीने आणि नियोजनबद्ध पुनर्विकास आवश्यक आहे. महापालिकेच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या कामासाठी १६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मूळ प्रस्तावानुसार, फेज १ अंतर्गत ६७.८५ कोटी रुपये आणि फेज २ अंतर्गत १३५.७६ कोटी रुपयांची कामे हाती घेण्याचे नियोजन होते. सध्या १० मीटर रुंद असलेल्या या रस्त्याची नियमानुसार रुंदी ६० मीटर असणे अपेक्षित आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन प्रमुख चौकांवर उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याची योजना होती. या योजनेनुसार, पीव्हीपीआयटी कॉलेज चौकात ४३० मीटर लांबीचा (१२० मीटर आरसीसी) ग्रेड सेपरेटर सुमारे २७ कोटी रुपये खर्चाने उभारण्याचा प्रस्ताव होता. तसेच, एम्ब्रोसिया आणि पाटील नगर चौकात ८७० मीटर लांबीचा (५४४ मीटर आरसीसी) उड्डाणपूल सुमारे ८२ कोटी रुपये खर्चाने उभारण्याचे नियोजन होते. याव्यतिरिक्त, राम नदीवर ३० मीटर लांबीचा आणि ७० मीटर रुंदीचा पूल उभारण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे नदी ओलांडताना होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. हा मार्ग पिरंगुट, रोहा, माणगाव यांसारख्या औद्योगिक क्षेत्रांना तसेच हिंजेवाडी आयटी पार्कला जोडणारा असल्याने त्याच्या विकासाला विशेष महत्त्व आहे. मागील बैठकीत ७२ (ब) कलमांतर्गत पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने २०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तथापि, एवढ्या मोठ्या निधीची उपलब्धता कठीण असल्याने स्थायी समितीने प्रशासनाला अधिक व्यवहार्य आणि सुधारित फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महसूल विभागाच्या रचनेत मोठे बदल होणार असून एकूण ३५ हजार ८७६ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. मुद्रांक, भूमी अभिलेख आणि महसूल विभाग या तिन्ही विभागांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. तब्बल वीस वर्षांनंतर महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध सरकारने मान्य केला असून आज याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे. याआधी, महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध २००६ मध्ये झाला होता. मागील वीस वर्षांत महसूल व बिगर महसुली कामात अनेक बदल झाले, त्यामुळे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने या आकृतिबंधाला मान्यता दिली. महसूल विभागातील ३४ हजार ५७६ नियमित व १३०० बाह्यस्रोतांद्वारे असे मिळून ३५,८७६ पदांचा आकृतीबंध महाराष्ट्र शासनाने मान्य केला आहे. प्रशासकीय पुनर्रचना आणि नवीन कार्यालये शासनाने महसूल विभागाची नवीन संरचना निश्चित केली असून, यामध्ये विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवरील कार्यालयांचा समावेश आहे. यात ६ विभागीय आयुक्तालये, ३६ जिल्हाधिकारी कार्यालये, १९२ महसूल उपविभागीय कार्यालये आणि ३६० तहसीलदार कार्यालयांचा समावेश आहे. तसेच क्षेत्रीय स्तरावर २,६२५ मंडळ कार्यालये आणि १५,७४७ तलाठी साजांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. प्रशासकीय सोयीसाठी ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये आणि ८ नवीन उपविभागीय कार्यालय, २ तहसीलदार कार्यालय, ६९ अपर तहसीलदार कार्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. कामकाजात आधुनिकता आणि वेग येणार राज्यातील महसूल यंत्रणा अधिक लोकाभिमुख आणि सक्षम करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. उमाकांत दांगट समितीच्या शिफारशींनुसार हा सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून, यामुळे महसूल विभागाच्या कामकाजात आधुनिकता आणि वेग येणार आहे. नवीन कार्यालयांचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया आता जिल्हाधिकारी स्तरावर वेगाने पूर्ण केली जाणार आहे. गतिमान प्रशासनासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल - चंद्रशेखर बावनकुळेमहसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून, काळानुरूप वाढलेला कामाचा व्याप आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन हा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. यामुळे प्रशासकीय कामात अधिक सुसूत्रता येईल, नवीन कार्यालयांमुळे जनतेला कामासाठी दूर जावे लागणार नाही आणि कामकाजात मोठी गती येईल. पारदर्शक आणि गतिमान प्रशासनासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे महसूल मंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
पुण्यात अवकाळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित:झाडे पडली, पाणी साचले; दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू
पुणे शहर आणि परिसरात गुरुवारी (२ मे) दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वादळ झाले. यामुळे अनेक अतिउच्चदाब व उच्चदाब वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला, परिणामी शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. सुमारे एक तास झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांवर झाडे पडली. काही ठिकाणी फिडर बॉक्समध्ये पाणी शिरल्याने वीजवाहिन्या बंद पडल्या, तर विजेच्या कडकडाटामुळेही काही वाहिन्या बाधित झाल्या. अनेक भागांचा वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यात आला आहे. कोथरूड भागात कुंदनगरी फिडरवर विजेच्या कडकडाटामुळे आकाशातील विजेला अटकाव करणारी यंत्रणा बाधित झाली. यामुळे संबंधित वाहिनीचा वीजपुरवठा ठप्प झाला होता, मात्र पर्यायी मार्गाने तो सुरळीत करण्यात आला. सध्या केवळ दोन रोहित्रे बंद आहेत. नांदेडसिटी अतिउच्चदाब वाहिनीवर ट्रिपिंग आल्याने कोथरूड विभागातील वीजपुरवठा अर्धा तास बाधित झाला होता, जो पाऊस थांबताच पूर्ववत झाला. शिवाजीनगर विभागातील विद्यापीठ, खडकी, बावधन, बाणेर आणि शिवाजी हाऊसिंग सोसायटी या वाहिन्यांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. यापैकी विद्यापीठ वाहिनी सुरू करण्यात यश आले आहे. पिंपरी/भोसरी भागातील रावेत २२ केव्ही वाहिनीचा वीजपुरवठा खंडित झाला असून, यावरील ५८ रोहित्रे बंद पडली आहेत. महावितरणचे कर्मचारी पर्यायी मार्गाने ती सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. पर्वती भागातील महावितरणच्या जुन्या पर्वती वीज उपकेंद्रातील फिडरवर झाड पडले होते. ते हटवून वीजपुरवठा सुरू करण्याचे काम सुरू आहे. प्रयेजा व मधुकोश वाहिनीच्या इनकमिंग फिडर बॉक्समध्ये पाणी साचल्याने वीजपुरवठा बंद झाला आहे. खडकवासला आणि श्रवण वाहिनीच्या पेट्रोलिंगचे काम हाती घेतले असून, बिघाड सापडताच दुरुस्ती केली जाईल. बंडगार्डन विभागातील वडाचीवाडी येथील उपरी वीज वाहिनीवर झाडाच्या फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता, तर वाडिया वाहिनी तासाभरात पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आली. रास्तापेठ विभागातील कोंढवा, येवलेवाडी भागाला वीजपुरवठा करणाऱ्या अतिउच्चदाब वाहिनीवरही परिणाम झाल्याने वीजपुरवठा बाधित झाला. याव्यतिरिक्त, काही भागांमध्ये लघुदाब वाहिन्यांवरही पावसाचा परिणाम झाला असण्याची शक्यता आहे.
पुण्यात झाड कोसळून महिलेचा मृत्यू:सिंहगड रोडवर फुल विक्रेत्या रंजना गिरी यांचा दुर्दैवी अंत
पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात अवकाळी पावसात एक दुर्दैवी घटना घडली असून नवश्या मारुती मंदिराशेजारील पिंपळाचे भले मोठे झाड अचानक कोसळल्याने एका साठ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव रंजना नवनाथ गिरी (वय 60) असे असून त्या परिसरात फुल विक्रीचा व्यवसाय करत होत्या. दररोजप्रमाणे त्या मंदिराजवळ आपला व्यवसाय करत असताना अचानक हे झाड कोसळले. झाड कोसळण्याचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत महिलेस झाडाखालून बाहेर काढले. मात्र त्यावेळी त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर नागरिकांनी महापालिकेच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त केला आहे. परिसरातील अनेक जुनी व धोकादायक झाडे वेळोवेळी छाटणी न केल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळांच्या आसपास असलेल्या झाडांची नियमित तपासणी व देखभाल करणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांनी नमूद केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. तसेच परिसरातील इतर धोकादायक झाडांची पाहणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सिंहगड रोड परिसरात हळहळ व्यक्त केली.
सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या दोन अत्यंत घृणास्पद घटना समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत, एका पाच वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग करणाऱ्या 46 वर्षीय हरीष भावे या नराधमाला टिळकनगर पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. तर, दुसऱ्या धक्कादायक घटनेत एका 22 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तीन रिक्षा चालकांना पोलिसांनी अटक केली आहे. एकाच वेळी उघडकीस आलेल्या या दोन्ही घटनांमुळे डोंबिवली परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील आरोपी हरीष भावे याने एका चिमुरडीच्या असहायतेचा फायदा घेत हे निंदनीय कृत्य केले. पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर असल्याचे पाहून आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे केले. पीडित चिमुरडीने घडलेला सर्व संतापजनक प्रकार पालकांना सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या पोटच्या गोळ्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे हादरलेल्या पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेत या प्रकरणाला वाचा फोडली. आरोपी लोकांच्या घरी जाऊन पूजा सांगायचा पालकांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विलंब न लावता मुलीसह टिळकनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्वरित हालचाली करत गुन्हा दाखल केला आणि आरोपी हरीष भावे याला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेला आरोपी लोकांच्या घरी जाऊन पूजा सांगण्याचे काम करायचा, अशी माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 22 वर्षीय महिलेवर अत्याचार डोंबिवलीत महिलांवरील अत्याचाराची दुसरी घटना समोर आली असून, सोलापूरची रहिवासी असलेल्या आणि डोंबिवलीतील एका सुरक्षा रक्षक एजन्सीमध्ये काम करणाऱ्या 22 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे. ओळखीच्या रिक्षाचालक मित्रांनी तिला पार्टीच्या बहाण्याने खंबाळपाडा येथील एका घरात नेले. तिथे पार्टी केल्यानंतर मुख्य आरोपीने तिला मारहाण व शिवीगाळ करत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित महिलेने तातडीने टिळकनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदम आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अवघ्या काही वेळातच शोधमोहीम राबवून उमेश वर्मा, चेतन चव्हाण आणि हेमंत चव्हाण या तीन रिक्षाचालक आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यातील उमेश वर्मा हा मुख्य आरोपी असून, हे तिन्ही आरोपी डोंबिवली परिसरात रिक्षा चालवण्याचे काम करतात, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
पुणे शहरात गुरुवारी दुपारनंतर अचानक हवामानात मोठा बदल झाला आणि भर उन्हातच काळोख दाटून आला. त्यानंतर काही मिनिटांतच मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले. अनेक भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला, तर काही ठिकाणी गारपिटीची नोंदही झाली. या अचानक बदलामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. पुण्यात सिंहगड रोडवरील नवश्या मारुती मंदिरा शेजारील पिंपळाचे भले मोठे वृक्ष कोसळले. यात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दुपारच्या सुमारास सुरू झालेल्या या पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाणी साचले. काही ठिकाणी तर रस्त्यांवरून अक्षरशः पाण्याचे प्रवाह वाहताना दिसले. सिंहगड रोड, मणिकबाग, कोंढवा बुद्रुक, प्राईड हॉस्पिटल परिसर, धानोरी आणि बालाजीनगर या भागांत पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही वाहनं पाण्यात अडकून थांबली, तर अनेकांनी वाहनांच्या हेडलाईट सुरू करूनच प्रवास केला. उन्हाळ्याचा काळ असल्याने नागरिक छत्री किंवा रेनकोट न घेता घराबाहेर पडले होते. त्यामुळे अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची चांगलीच धांदल उडाली. जवळपास तासभर सुरू असलेल्या मुसळधार सरींमुळे शहरात वाहतुकीवर परिणाम झाला. पिंपरी-चिंचवड परिसरातही याच स्वरूपाचा पाऊस पडला आणि उद्योगनगरीतही अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. या अवकाळी पावसाचा परिणाम केवळ शहरापुरता मर्यादित राहिला नाही. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही जोरदार पावसाची नोंद झाली असून, काही ठिकाणी गारपिटीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची ये-जा सुरू असल्याने शेतीपिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान अनिश्चित राहण्याची शक्यता दरम्यान, हनुमान जयंतीच्या उत्सवातही या पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी मंदिर परिसरात आणि मंडपात पाणी साचले. भाविकांची गैरसोय झाली असली तरी, या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. वातावरणात अचानक झालेल्या गारव्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अवकाळी पावसाच्या या तडाख्याने पुढील काही दिवस हवामान अनिश्चित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तेहरान : अमेरिका-इस्रायल यांनी केलेल्या हल्ल्यानंतर इराणने जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला समुद्री मार्ग रोखून धरला आहे. यानंतर मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्ष सध्या शिगेला पोहोचला असून याची झळ जगभरातील देशांना बसत आहे. यादरम्यान इराणने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून एक खास संदेश जारी करत होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत भारताला आश्वस्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर […] The post भारत आमचा मित्र, काळजी नसावी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंब्र्यात भरदिवसा थरार!:छेडछाडीच्या वादातून चौघांवर बेछूट गोळीबार; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
ठाण्यातील मुंब्रा येथील कैलास नगर परिसरात गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भरदिवसा झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. छेडछाडीच्या वादातून संतापलेल्या एका आरोपीने सुमनताई चव्हाण प्राथमिक विद्यालयाजवळ चौघांवर बेछूट गोळीबार केला, ज्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयन शिवानंदन नायर (51) याने आपल्या मानलेल्या बहिणीच्या छेडछाडीच्या वादातून हा भीषण हल्ला केला. संतापाच्या भरात असलेल्या जयनने भररस्त्यात अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख आणि समीर अहमद शेख यांच्यावर बेछूट गोळ्या झाडल्या. या गोळीबारात अकबर शेख यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या काळसेकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे ही घटना शाळेजवळच घडल्याने विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून येथील स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, मुंब्रा पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही वेळातच आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेमुळे मुंब्रा येथे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भरदिवसा असे गोळीबाराच्या घटना घडत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच आता या प्रकरणातील पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
खरीप हंगामावर खतटंचाईचे सावट!; रसायनांच्या दरात १५ ते ५० टक्के वाढ
मुंबई : प्रतिनिधी सध्या शेतक-यांवर चहूबाजूंनी संकट उभे ठाकले आहे. ‘एल निनो’मुळे वेळेत आणि पुरेसा पाऊस पडेल का? खरीप हंगामातील पेरण्या वेळेत झाल्या तर खतांच्या वाढत्या किमती यामुळे बळिराजा चिंतेत आहे. आखाती युद्धामुळे जागतिक पातळीवर रासायनिक खतांची पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा परिणाम जाणवत आहे. खते तयार करण्यासाठी लागणा-या विविध रसायनांच्या किमती १५ ते ५० टक्क्यांनी […] The post खरीप हंगामावर खतटंचाईचे सावट!; रसायनांच्या दरात १५ ते ५० टक्के वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आदिश जैन फाऊंडेशनच्या वतीने ज्येष्ठ समाजसेविका आणि गझलकारा ममता सपकाळ यांना २०२६ सालचा 'कार्यगौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्य आणि साहित्यातील त्यांच्या समर्पित योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला. यावेळी सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि रोख रक्कम देऊन सपकाळ यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक म. भा. चव्हाण, गझलकार सुधीर मुळीक, ॲडव्होकेट व समाजसेविका प्रार्थना सदावर्ते आणि संस्थेच्या अध्यक्षा मृणाल जैन उपस्थित होत्या. यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक म. भा. चव्हाण म्हणाले, स्त्रियांचे पूजन करून अघोरी प्रकार केले जात असतील, तर ते किती वाईट आहे, याचा समाजाने विचार करणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले की, स्त्रियांना आरक्षण दिले नाही तरी चालेल; मात्र त्यांना संरक्षण देणे अत्यावश्यक आहे. स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी निर्भयता बाळगावी आणि एकमेकींना सहकार्य करावे. समाज अजूनही स्त्रियांप्रती संवेदनशील झालेला नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. चव्हाण यांनी असेही नमूद केले की, एखाद्या धर्मग्रंथात स्त्रियांचा अवमान असेल, तर त्यात बदल झाला पाहिजे. त्यांनी 'रडायला नको, लढायला शिकवा' असा संदेश दिला आणि पुरुषांकडून आता क्रांतीची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही, असेही ते म्हणाले. संस्थेच्या अध्यक्षा मृणाल जैन यांनी फाऊंडेशनची उद्दिष्टे स्पष्ट केली आणि मागील सहा महिन्यांतील संस्थेच्या कामगिरीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर वैष्णवी पाटांगणकर यांनी सरस्वती वंदना सादर केली. नीलिमा फाटक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रार्थना सदावर्ते यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात महिला गझल मुशायरा रंगला. प्रभा सोनवणे, सुनीती लिमये, सुजाता पवार, स्वाती यादव, वैशाली माळी आणि नीलिमा फाटक या ज्येष्ठ गझलकारांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

32 C