मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे भोंदू अशोक खरातशी संबंध असल्याचे पुरावे द्या, असे जाहीर आव्हान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना दिले आहे. विजय वडेट्टीवार यांनी आपल्याकडील पुरावे सरकार किंवा तपास यंत्रणांना द्यावेत. त्यांनी माझ्याकडेही याची साधी तक्रार करावी. माझे त्यांना खुले आव्हान आहे, असे ते म्हणालेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे भोंदू अशोक खरातशी संबंध असल्याचा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे. अशोक खरातचे मंत्रालयातील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संबंध होते. एवढेच नव्हे तर तो या अधिकाऱ्यांना एकमेकांच्या पत्नींसोबत संबंध ठेवण्याचाही सल्ला देत होता. या प्रकारामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे, असे ते म्हणालेत. पत्रकारांनी आज नागपुरात याविषयी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना छेडले असता त्यांनी उपरोक्त आव्हान दिले. सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू नका चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, माझे विजय वडेट्टीवार यांना खुले आव्हान आहे. त्यांनी माझ्याकडे साधी तक्रार द्यावी. मी एका अधिकाऱ्याबद्दलचे ट्विट वाचले आहे. त्यांच्याकडे काही पुरावे असतील, तर असा नुसता भोंगा वाजवून काही होणार नाही. त्यांना खरी चौकशी हवी असेल तर त्यांनी सरकार, तपास यंत्रणा किंवा मुख्यमंत्र्यांना तसे कळवले पाहिजे. त्यात कोणत्या अधिकाऱ्याचा समावेश आहे याचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यावर सरकार योग्य ती कारवाई करेल. पण केवळ माध्यमांना बाईट देऊन प्रसिद्धी मिळवायची असे करू नये. अशोक खरातचे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे आपल्या बोलण्यातून तपासावर दबाव येऊ नये. चौकशी यंत्रणांवर दबाव येऊ नये याची काळजी वडेट्टीवार यांनी घेतली पाहिजे. अशा प्रकरणांत खूप बाईट न देता तुमच्याकडे जे पुरावे आहेत? कोणता महसुली अधिकारी यात इन्व्हॉल्व्ह आहे? याचे एक पत्र त्यांनी आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत दिले पाहिजे मी त्यांची वाट बघेन, असे ते बावनकुळे म्हणाले. ते वडेट्टीवारांवर आणखी हल्ला चढवत म्हणाले, कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल असे वाईट बोलू नये. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल असे बोलणे चांगले नाही. त्यांची कुटुंबातील विश्वासार्हता खराब करणे योग्य नाही. वडेट्टीवारांनी त्यांच्याकडील गोपनिय माहिती सरकाराल दिली पाहिजे. अशा पद्धतीचा आरोप करून त्यांनी प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे उद्योग करू नये. आदित्य ठाकरे - मोहित कंबोजच्या पार्टीवरही भाष्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या पार्टीला आदित्य ठाकरेंनी हजेरी लावल्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, मोहित कंबोज यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. कौटुंबिक कार्यक्रमात सर्वच जण जातात. मी ही जाणार होतो. पण माझे विमान सुटले. त्यामुळे मोहित कंबोज यांचे उद्योगपती म्हणून जे काही संबंध आहेत, ते सर्वांशी आहेत. अंबानी, अदानी यांच्याकडेही आपण जातो. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याकडे गेले तर काय बिघडले? यात जवळीक साधण्याचा प्रश्नच येत नाही. तुमच्याकडे वाढदिवसाला आलो, तर जवळीक नाही तर कौटुंबिक संबंध तयार होतात. कौटुंबिक संबंधांतून कुणी कुणाकडे जात असेल तर त्याचा राजकारणाशी कोणताही संबंध नसतो. शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही सोशल मीडियात इंधन टंचाई व रासायनिक खतांच्या टंचाई झाल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे. कुणालाही घाबरण्याची गरज नाही. खताच्या साठेबाजीवरही सरकारचे लक्ष आहे. एखाद्या दुकानदाराने साठेबाजी केली तर सरकार त्याला सोडणार नाही. मी स्वतः जातीने दुकानांची चौकशी करणार आहे. त्यामुळे या स्थितीचा शेतकऱ्यांना कोणताही फटका बसणार नाही, असे ते म्हणाले.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी अनेक नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे, अशोक खरातला दिलेल्या शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसात 12 वर्षांत नोंदच नाही. तसेच खरातला शस्त्र परवाना दिल्याची ग्रामीण पोलिसांनाच माहिती नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आता अशोक खरातला बंदुकीचा परवाना नेमक्या कोणत्या कागदपत्रांच्या आधारे मिळाला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्हा प्रशासनाने परवाना दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती देणे बंधनकारक असते, मात्र यासंदर्भातील माहिती ग्रामीण पोलिसांनाच नसल्याची समोर आले आहे. तसेच गेल्या 12 वर्षांत खरातच्या शस्त्र परवान्याची नोंद देखील नाही. त्यामुळे आता या खुलास्यामुळे प्रशासन देखील अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एनडीएएल एएलआयएस (NDAL ALIS) ऑनलाइन प्रणालीमध्ये अशोक खरातच्या क्षत्र परवान्याची नोंद नसल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे आता स्थानिक पोलिस स्टेशन, तत्कालीन तहसीलदार प्रांत अडचणीत येण्याची शक्यता आहे. अशोक खरातच्या पोलिस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ दरम्यान, महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेल्या अशोक खरातच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने 1 एप्रिलपर्यंत वाढ केली असून, या निर्णयामुळे तपासाला आता अधिक गती मिळणार आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून नवनवीन पीडित महिला तक्रारीसाठी पुढे येत असल्याने, तपासादरम्यान अद्याप अनेक धागेदोरे उलगडणे बाकी आहे. खरातच्या गुन्हेगारी साम्राज्याचे जाळे नेमके कुठपर्यंत पसरले आहे आणि या वाढीव कोठडीत पोलिस तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्योगपतींचे कर्ज माफ करताना निकष का लावत नाही:क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आंदोलन करण्याचा इशारा
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना शासनाकडून निकष लावले जात आहेत मात्र उद्योगपतींचे कर्ज माफ करताना निकष का लावले जात नाहीत. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांवरच अन्याय का केला जातो? असा सवाल क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर सातबारा कोरा हवा यासाठी मराठवाडाभर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी 'दिव्य मराठी'शी बोलताना क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र निवडणूक होऊनही सातबारा कोरा झालाच नाही. त्यानंतर शासनाने शेतकऱ्यांचा असंतोष लक्षात घेता दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केले तर नियमितपणे कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले. मात्र हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचा आरोप कावरखे यांनी केला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीची एसओपी तयार केली जात असल्याचे सांगितले. गाडी बंगला असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला हवी असं वक्तव्य त्यांनी केले त्यांच्या या वक्तव्याचा क्रांतिकारी शेतकरी संघटना जाहीर निषेध करीत असल्याचे कावरखे यांनी सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना शेतकऱ्यांची गाडी आणि बंगला बघून कर्जमाफी करण्याच्या निर्णयाचा निषेधच आहे. ज्या वेळेस उद्योगपतीचे 16 लाख कोटीचं कर्ज राईट ऑफ च्या नावा खाली माफ केले जाते, तेव्हा कुठलीच अट लावली जात नाही. तसेच महाराष्ट्र मध्ये आणि देशांमध्ये कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू केला जातो तेव्हा कुठल्याच प्रकारे अट लावल्या जात नाही तेव्हा त्यांना सरसकट वेतन लागू केल्या जाते मग शेतकऱ्यांच्याच कर्जमाफीच्या वेळी अटी कशामुळे असा सवाल ही त्यांनी केला. फसवी कर्जमाफी शेतकऱ्यांना मान्य नाही राज्य शासनाची फसवी कर्जमाफी आम्हा शेतकऱ्यांना मान्य नाही. वातानुकूलित कक्षात बसून काम करणाऱ्यांना आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा दुःख काय कळणार. सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसेच त्यांचा सातबारा कोरा करावा अन्यथा शासनाच्या विरोधामध्ये मराठवाड्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रवीण मते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
देशातील एलपीजी सिलिंडरच्या मुद्द्यावरून आता सत्ताधाऱ्यांमध्येच मतभेद असल्याचे चित्र समोर येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मंत्रिमंडळातील मंत्रीच एकमेकांना पत्र लिहित आहेत, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वस्तुस्थिती स्पष्टपणे मांडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. एलपीजीसारख्या महत्त्वाच्या विषयावर सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसत असल्याचे त्यांनी सूचित केले. जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीची जाणीव असल्याचेही सुळे यांनी स्पष्ट केले. देशावर संकट ओढवल्यास विरोधक म्हणून आम्ही जबाबदारीने वागू, असे त्यांनी सांगितले. मागील आठवड्यात गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतही त्यांनी सहकार्याची भूमिका मांडल्याचे त्यांनी नमूद केले. देशहिताच्या प्रश्नांवर राजकीय मतभेद बाजूला ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. जर देश अडचणीत असेल, तर आम्ही सरकारसोबत उभे राहण्यास तयार आहोत, असे सुळे म्हणाल्या. मात्र, अशा संवेदनशील विषयांवर सरकारने पारदर्शक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. एलपीजीच्या दरवाढीपासून ते पुरवठ्यापर्यंतच्या सर्व बाबींवर स्पष्टता हवी, असे त्यांनी ठामपणे मांडले. सरकारने नागरिकांपुढे खरी परिस्थिती मांडावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. आम्ही कधीच विरोधकांना शत्रू मानले नाही सुप्रिया सुळे यांनी अलीकडील राजकीय चर्चांवर प्रतिक्रिया देताना विरोधकांविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आदित्य ठाकरे आणि मोहीत कंबोज यांच्या भेटीबाबत विचारले असता, हा त्यांचा वैयक्तिक विषय असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाही व्यवस्थेत कोण कोणाला भेटायचे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, असे नमूद करत त्यांनी या भेटीवरून अनावश्यक वाद निर्माण करू नये, असेही स्पष्ट केले. सुळे यांनी पुढे सांगितले की, राजकारण आणि कौटुंबिक कार्यक्रम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या मुलीच्या वाढदिवसासारख्या आनंदाच्या प्रसंगी उपस्थित राहण्यात काहीच गैर नाही, असे त्यांनी ठामपणे मांडले. आम्ही कधीच विरोधकांना शत्रू मानले नाही, असे सांगत त्यांनी मतभेद असणे स्वाभाविक असले तरी मनभेद होऊ नयेत, अशी भूमिका मांडली. राजकीय मतभेद असूनही सामाजिक नातेसंबंध टिकवणे हीच खरी लोकशाही संस्कृती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
राज्यात 2012 पासून एकाही नव्या ग्रंथालयाला मान्यता देण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तत्काळ योग्य ते पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे. ज्ञान ही समाजाची खरी ताकद असते, पण आज हीच ताकद कमकुवत करण्याची प्रक्रिया नकळतपणे सुरू आहे, असे ते म्हणालेत. गाव तिथे ग्रंथालयाची घोषणाऱ्या राज्य सरकारने 2012 पासून एकाही सार्वजनिक ग्रंथालयाला मान्यता दिली नाही. त्यात रखडलेले अनुदान, कर्मचाऱ्यांचे मानधन व मंदावलेल्या पुस्तक खरेदीमुळे राज्यातील 11 हजार सार्वजनिक ग्रंथालयांना घरघर लागली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रश्नात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. गाव तिथे ग्रंथालय संकल्पना केवळ घोषणांपुरती जयंत पाटील म्हणाले, ज्ञान ही समाजाची खरी ताकद असते. पण आज हीच ताकद कमकुवत करण्याची प्रक्रिया नकळतपणे सुरू आहे, असे चित्र दिसते. वाचनसंस्कृती जोपासणारी आणि ज्ञानाची कवाडे उघडी ठेवणारी ग्रंथालय व्यवस्था दिवसेंदिवस दुर्लक्षित होत चालली आहे. “गाव तिथे ग्रंथालय” ही संकल्पना केवळ घोषणांपुरती मर्यादित राहिली आहे. 2012 पासून अनेक ग्रंथालयांना मान्यता मिळालेली नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. जे आधीपासून कार्यरत आहेत, त्यांची अवस्था देखील बिकट आहे. कर्मचाऱ्यांचे मानधन रखडलेले आहे, अनुदान थकलेले आहे आणि नवीन पुस्तकांची खरेदी जवळपास थांबली आहे. परिणामी, ग्रंथालये ही जिवंत ज्ञानकेंद्र न राहता केवळ बंद कपाटांची जागा बनत चालली आहेत. 40 टक्के अनुदान देण्यासाठी 42 कोटी द्या ते म्हणाले, वाचन चळवळ ही समाजाला विचारशील, सुसंस्कृत आणि प्रगल्भ बनवणारी चळवळ आहे. मात्र, ही चळवळ रुजवणारी यंत्रणाच जर कुचकामी ठरत असेल, तर त्याचे परिणाम दूरगामी ठरू शकतात. आजची तरुणाई मोठ्या प्रमाणावर मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. माहितीचा स्फोट झाला असला तरी त्यात सखोलता आणि चिकित्सक दृष्टिकोन कमी होत चालला आहे. अशा परिस्थितीत तरुणांना योग्य दिशेने वळवण्याची जबाबदारी शासनाची आणि समाजाची आहे. पण प्रत्यक्षात वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा नाहीत. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, त्यांनी ग्रंथालयांना 40 टक्के अनुदान देण्यासाठी लागणारे 42 कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत. भविष्यातील महाराष्ट्र घडविण्यासाठी हे पाऊल उचलावे. वाचनाची सवय कमी झाली, तर विचार करण्याची क्षमता खुंटते. परिणामी समाज अधिक संकुचित बनतो. म्हणूनच, शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना देणे अत्यावश्यक आहे. तसेच समाजानेही वाचनाची सवय पुन्हा जोपासण्याचा संकल्प केला पाहिजे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
बापाच्या चुका झाकायला मुलीची कसरत होत असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी केली आहे. रायगडच्या इंदापूर येथे जिल्हा परिषद व नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्षाच्या बॅनरवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री व पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा फोटो वगळण्यात आल्याने यावर विरोधकांनी टीका केली होती. यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आपली बाजू मांडत सवरासावर करण्याचा प्रयत्न केला होता. यावर पुन्हा एकदा विकास लवांडे यांनी निशाणा साधला आहे. विकास लवांडे यांनी ट्विट करत म्हटले की, किती हे लंगडे स्पष्टीकरण आहे? लोक दूधखुळे नाहीत. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमाला काहीह प्रोटोकॉल असतात, पण रायगडमध्ये तटकरे पार्टी आहे. अजित दादांची पार्टी तुम्ही पुसून टाकली आहे. आता दिलगिरी करून सारवासारव करू नये. बापाच्या चुका झाकायला एका मुलीची कसरत होत आहे याची जाणीव निश्चितपणे आम्हाला आहे, असे लवांडे यांनी म्हटले. मंत्री असूनही महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी ब्र सुद्धा उच्चारला नाही पुढे बोलताना विकास लवांडे म्हणाले, आपण महिला कल्याण मंत्री असूनही अशोक खरात प्रकरणी इतक्या महिलांचे शोषण व लैंगिक अत्याचार होऊन सुद्धा ब्र शब्द आपण अद्याप पर्यंत उच्चारलेला नाही. आदरणीय शरद पवार साहेबांनी महिला बालकल्याण खाते ज्या उद्देशाने निर्माण करून ठेवले त्या उद्दिष्टासाठी आपण कधी काम करणार आहात? असा सवाल अदिती तटकरे यांना उद्देशून लवांडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच तुमच्या खात्याचे लाडकी बहीण खाते असे नामकरण करावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. दुनिया सब जानती है.. अशोक खरात प्रकरणी एक मंत्री म्हणून काहीही न बोलणे, कोणतीही भूमिका स्पष्ट न करणे, कोणतीही ठोस कार्यवाही न करणे हे कोणाच्या हितासाठी आहे? दुनिया सब जानती है, अशी खरमरीत टीका विकास लवांडे यांनी केली आहे. अदिती तटकरेंनी काय म्हटले होते? पक्षाच्या बॅनरवर अजित पवार तसेच सुनेत्रा पवार यांचा फोटो वगळण्यात आल्यावर स्पष्टीकरण देताना अदिती तटकरे म्हणाल्या, स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम घेतले जातात, असे अनेक कार्यक्रम दिवसभरात होत असतात. अशाच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले दिवंगत नेते अजितदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी यांचा फोटो नव्हता, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. अजितदादा असतील, सुनेत्राकाकी असतील यांचे आमच्या मनातील स्थान अढळ आहे. बॅनरवरील फोटोतून आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये. पुढे अदिती तटकरे म्हणाल्या, तरी, यानिमित्ताने एक बरे झाले- स्थानिक कार्यक्रमातील स्थानिक पातळीवर घडलेल्या एका चुकीचा मुद्दा बनवणारी यंत्रणा कशी काम करते हे आमच्या लक्षात आले. हा मुद्दा चवीने चघळणाऱ्यांना दादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल मनातून किती पश्चाताप व्यक्त करावा लागत असेल देव जाणे..! बाकी काकींना पक्षाच्या कुटुंबप्रमुख म्हणून आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार आहेच, असे तटकरे म्हणाल्या.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडवली असताना आता या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण मिळाले आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, अशोक खरात याचे मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध होते. इतकेच नव्हे तर तो या अधिकाऱ्यांना एकमेकांच्या पत्नींसोबत संबंध ठेवण्याचा सल्ला देत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. वडेट्टीवार यांनी पुढे सांगितले की, अशोक खरातच्या मोबाईलमध्ये अनेकांची नावे कोडवर्डमध्ये सेव्ह करण्यात आली होती. यामागे कारण असे की, तो अनेकांचे काळे पैसे पांढरे करण्याचे काम करत होता, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ काही व्यक्तींवर कारवाई करून चालणार नाही, तर ज्या 49 आमदारांचे फोटो खरातसोबत आढळले आहेत, त्या सर्वांची चौकशी व्हावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे अनेक सरकारी अधिकारी आपल्या कुटुंबियांसह खरातकडे जात असल्याचेही समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये पती स्वतःच्या पत्नींना खरातकडे पाठवत असल्याचे आरोप आहेत. अशा व्यक्तींनाही तितकेच दोषी धरले पाहिजे आणि त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून मोठ्या जाळ्याचा भाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वडेट्टीवार यांनी आणखी एक धक्कादायक दावा करत सांगितले की, अनेक प्रभावशाली व्यक्तींच्या पत्नी खरातच्या ऑफिसमध्ये जात असत आणि त्यांचे नवरे बाहेर थांबत असत. मात्र, आत नेमके काय घडत होते याबाबत ठोस पुरावे नसल्याने त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. सध्या समोर येणारे व्हिडिओ हे निवडक असल्याचेही त्यांनी नमूद केले. खरातच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या पेनड्राईव्हमध्ये सुमारे हजार व्हिडिओ असल्याचा दावा असून त्यापैकी केवळ 150 व्हिडिओच बाहेर आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारे प्रकरण या संपूर्ण प्रकरणावर टीका करताना वडेट्टीवार यांनी म्हटले की, हे अत्यंत घाणेरडे आणि महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारे प्रकरण आहे. तरीही सरकारकडून संबंधित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणात सामील असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. दरम्यान, या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडालेली असतानाच आता या प्रकरणाला नवं राजकीय वळण मिळालं आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधानपरिषद सदस्य नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. गोऱ्हे या गेल्या काही वर्षांपासून अशोक खरातच्या संपर्कात होत्या आणि राजकीय फायद्यासाठी त्याला भेटत असल्याचा दावा देसाईंनी केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तृप्ती देसाई यांच्या मते, नीलम गोऱ्हे या मागील पाच ते सहा वर्षांपासून खरातकडे जात होत्या. त्यांनी आमदारकी किंवा मंत्रीपदासाठी त्याची मदत घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक विषयांवर स्पष्ट भूमिका घेणाऱ्या गोऱ्हे या खरात प्रकरणावर शांत का आहेत? असा सवाल उपस्थित करत देसाईंनी त्यांच्या आणि खरातमधील संबंधांवर संशय व्यक्त केला. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातील खरातच्या कार्यालयातही गोऱ्हे नियमितपणे जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याचबरोबर, देसाईंनी आणखी एक धक्कादायक दावा करत सांगितले की, नाशिकमधील एका पाचतारांकित हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली होती. पाथर्डी परिसरातील हॉटेलमध्येही खरात गोऱ्हेंना भेटण्यासाठी गेला होता, असे त्यांनी नमूद केले. या भेटीमागे काही आर्थिक व्यवहार होते का किंवा इतर काही संबंध होते का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे देसाईंनी स्पष्ट केले. तसेच, 39 आमदारांपैकी गोऱ्हे या खरातला भेटायला जात होत्या, असा आरोपही त्यांनी केला आहे. तृप्ती देसाई यांनी पुढे म्हटले की, गोऱ्हे या भविष्य जाणून घेण्यासाठी खरातकडे जात होत्या. ज्या कार्यालयात अनेक महिलांवर अत्याचार झाल्याचे आरोप आहेत, त्याच ठिकाणी गोऱ्हे गेल्याने या प्रकरणाची गंभीरता वाढते, असे त्यांनी सांगितले. गेल्या सात ते आठ वर्षांपासून गोऱ्हे यांची खरातशी ओळख असल्याचा दावा करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू दरम्यान, या आरोपांमुळे नीलम गोऱ्हे यांच्याभोवतीचा राजकीय वर्तुळ अधिकच तापले आहे. विशेष तपास पथकाकडून आधीच खरातच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असताना आता या नव्या आरोपांमुळे तपासाचा कक्षा वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात या प्रकरणात आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, गोऱ्हे यांच्यावरही चौकशीची मागणी जोर धरत आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अलीकडील घडामोडींवर प्रतिक्रिया देताना विरोधकांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. आदित्य ठाकरे हे कंबोज यांच्या घरी झालेल्या एका शुभकार्याला अल्प वेळासाठी उपस्थित होते, यावरून सुरू झालेल्या चर्चांना त्यांनी उत्तर दिले. एखाद्या व्यक्तीच्या घरी आनंदाचा कार्यक्रम असेल, तर तेथे जाण्यात गैर काहीच नाही, असे राऊत यांनी सांगितले. तसेच, विरोधकांच्या कार्यक्रमात सहभागी झालो तरी आमचे वैचारिक मतभेद कायम राहतात, हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. यावेळी त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदर्भ देत आपली भूमिका अधिक स्पष्ट केली. राजकीय मतभेद असले तरी मंगल प्रसंगी कटुता बाजूला ठेवून उपस्थित राहणे ही आपली परंपरा आहे, असे ते म्हणाले. कोणत्याही राजकीय मतभेदांपेक्षा मानवी नातेसंबंध आणि संस्कृतीला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे अशा कार्यक्रमात उपस्थित राहणे हे राजकीय तडजोड नसून सामाजिक कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, खासदार फुटीच्या चर्चांवरही राऊत यांनी ठाम प्रतिक्रिया दिली. आमचे नऊ खासदार आहेत आणि पुढील निवडणुकीपर्यंत ते एकत्रच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील राजकारणात पारदर्शकता कमी झाल्याची टीका करत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. आमच्या खासदारांना फोडण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अडचणींकडे लक्ष द्यावे, असा टोला राऊत यांनी लगावला. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…
खरात प्रकरणानंतर नवं वादळ:चाकणकर-चौधरी बिझनेस लिंक समोर; रायगडमध्ये कनेक्शन उघड, राजकारणात खळबळ
अशोक खरात प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्याबाबत आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे चाकणकर कुटुंबाचा बांधकाम व्यवसायाशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत चाकणकर आणि आकाश चौधरी यांच्यातील व्यावसायिक संबंधांवर प्रश्न उपस्थित करत सुनील तटकरे यांच्यावर थेट आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर आता समोर आलेल्या माहितीनं राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली चाकणकर यांचे पती नीलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे दोघे मिळून रोहा तालुक्यातील रोठ खुर्द परिसरात बांधकाम व्यवसाय करत आहेत. कर्मा कन्स्ट्रक्शन एलएलपी या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी बहुमजली इमारत उभारल्याची माहिती पुढे आली आहे. आकाश चौधरी यांच्या नावावर ओशन पर्ल मेरिटाइम प्रायव्हेट लिमिटेड, कोलाड आणि कर्जत येथील रिव्हर राफ्टिंग प्रकल्प, गीता अॅग्रो अँड इन्फ्रा, एफएल३ हॉस्पिटॅलिटी तसेच रॉक हिल अॅडव्हेंचर रिसॉर्टसारखे विविध व्यवसाय नोंदणीकृत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या बांधकाम प्रकरणावरून वाद अधिकच तीव्र झाला आहे. भाजप अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी या प्रकरणी माणगाव न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत संबंधित इमारत अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे चाकणकर आणि चौधरी यांच्यातील व्यावसायिक संबंधांबाबतचे दावे अधिक बळकट होत असल्याचे मानले जात आहे. चौकशीची शक्यता वाढली दुसरीकडे, अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर आधीच अडचणीत सापडल्या आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्यावरील चौकशीची शक्यता वाढली आहे. विशेष तपास पथकाने खरातशी संबंधित ‘शिवनिका’ संस्थेच्या व्यवहारांची चौकशी सुरू केली असून, या संदर्भात चाकणकर यांनाही समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर पुण्यात त्यांच्या विरोधात आंदोलन होण्याची शक्यता असून, येत्या काळात या प्रकरणात आणखी घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत.
नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवे धक्कादायक तपशील समोर येत असून आता तपासाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे गुंगी आणणारा द्रव आणि पेढ्यांचा वापर. रविवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीत पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आणखी वेळ मागितला. पोलिसांच्या मते, आरोपी अशोक खरात तपासात पूर्णपणे सहकार्य करत नसल्याने अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा होण्यासाठी अधिक वेळ आवश्यक आहे. यावर न्यायालयाने पोलिसांची बाजू ग्राह्य धरत आरोपीला 1 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, महिलांवर अत्याचार करण्यासाठी आरोपी विशिष्ट पद्धत वापरत होता. पीडित महिलांना तो प्रथम एक खारट किंवा कडवट चवीचा द्रव पिण्यास देत असे, तसेच त्यानंतर पेढा खायला देत असे. या दोन्ही गोष्टींचा परिणाम झाल्यानंतर महिलांना चक्कर येणे, मळमळ होणे किंवा शरीर जड झाल्यासारखे वाटणे अशा लक्षणांचा अनुभव येत होता. या अवस्थेचा फायदा घेत आरोपी त्यांना आपल्या ताब्यात घेत असे आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकारात वापरलेला द्रव पदार्थ नेमका कोणता होता, त्यामध्ये कोणते रासायनिक घटक होते आणि पेढ्यामध्ये कोणते गुंगी आणणारे पदार्थ मिसळले होते, याचा तपास अजून सुरू आहे. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीकडून या संदर्भात अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे या गूढाचा उलगडा करण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत तपास यंत्रणेला आणखी वेळ दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर देवस्थानासाठी मंजूर झालेल्या निधीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पर्यटनस्थळांच्या यादीत नसतानाही या देवस्थानासाठी 2018 मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून सुमारे 1 कोटी 5 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, या निधीसाठी प्रस्ताव कोणी दिला, शिफारस कोणी केली याबाबत प्रशासनाकडे स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. राजकीय संबंधांची छाननीही सुरू या सर्व घडामोडींमुळे अशोक खरात प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. एकीकडे महिलांच्या शोषणासाठी वापरल्या गेलेल्या पद्धतींचा उलगडा करण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे, तर दुसरीकडे आर्थिक आणि राजकीय संबंधांची छाननीही सुरू आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची चर्चा अजूनही सुरू असतानाच नवी मुंबईतून आणखी एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःला इस्रोचा शास्त्रज्ञ, डॉक्टर किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या 21 वर्षीय आदर्श म्हात्रेला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महिलांना लक्ष्य करून केलेल्या अशा फसवणुकीचे गंभीर वास्तव समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श म्हात्रे हा केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतलेला आहे. मात्र, त्याने अत्यंत चलाखीने मॅट्रिमोनी साईट्सवर 12 वेगवेगळ्या नावांनी बनावट प्रोफाईल तयार केली होती. उच्चशिक्षित आणि चांगल्या उत्पन्नाच्या महिलांना लक्ष्य करत तो त्यांच्याशी संपर्क साधत असे. स्वतःचे व्यक्तिमत्त्व प्रभावी दाखवण्यासाठी तो महागडे कपडे, राहणीमान आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करत होता. फसवणुकीची त्याची पद्धतही अत्यंत नियोजनबद्ध होती. सुरुवातीला तो स्वतःला शास्त्रज्ञ, डॉक्टर किंवा बँक अधिकारी असल्याचे सांगून महिलांचा विश्वास जिंकत असे. लग्नाचे आश्वासन देत तो त्यांच्याशी जवळीक निर्माण करत असे. विश्वास निर्माण झाल्यानंतर तो महिलांशी वैयक्तिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे शोषण करत असे. याचबरोबर, विविध कारणे सांगून त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती केवळ नवी मुंबईपुरती मर्यादित नसून राज्यातील अनेक शहरांपर्यंत पोहोचलेली आहे. नवी मुंबईसह मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, यवतमाळ आणि नागपूर येथेही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित महिलांच्या तक्रारींवरून तो वारंवार आपली ओळख बदलत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो अनेकांना सहजपणे फसवण्यात यशस्वी होत होता. ऑनलाइन ओळखी करताना अधिक सतर्क राहण्याची गरज दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणाचे काही धागेदोरे पुण्यातही आढळले आहेत. त्यामुळे पुढील तपासासाठी पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आहे. त्याच्या संपर्कात आणखी किती महिला होत्या आणि एकूण किती रकमेची फसवणूक झाली, याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे ऑनलाइन माध्यमांवर ओळखी करताना अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
आर्थिक वर्षाचा शेवटचा टप्पा म्हणजेच मार्च एंड. या ‘मार्च एंड’चे वारे आता विविध शासकीय कार्यालयातील प्रशासकीय वर्तुळात वेगाने वाहू लागले आहेत. अवघे दोन दिवस हातात उरल्याने महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व इतर शासकीय कार्यालये सुटीच्या दिवशीही शनिवार आणि रविवारीही गजबजलेली पाहायला मिळाली. वर्षभराचा निधी खर्च करणे आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी रविवारची हक्काची सुटी न घेता कामकाज करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून आले. वितरित करण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेला निधी शनिवार आणि रविवारची सुटी असूनही शनिवारी आणि रविवारी महत्त्वाची शासकीय कार्यालये उघडी होती. विशेषतः जिल्हाधिकारी कार्यालयात विविध योजनांचा निधी वरिष्ठ ३१ मार्चपूर्वी खर्च करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लिपिक आणि लेखा विभागातील कर्मचारी कामात व्यस्त होते. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीमधील शुकशुकाट सुटीच्या दिवशी जाणवतो, मात्र रविवारी चित्र वेगळे होते. जिल्हा परिषदेचा अर्थ विभाग पूर्णपणे गजबजलेला होता. ग्रामपंचायत स्तरावरील विकासकामे, शिक्षण आणि आरोग्य विभागाचे थकीत पगार आणि विकासकामांच्या फाइल्सची थप्पी लेखा व वित्त अधिकारी कार्यालयात पाहायला मिळाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा कोषागार कार्यालय, पुरवठा विभाग, मुद्रांक शुल्क निबंधक, राज्य उत्पादन शुल्क जिल्हा कार्यालयात सायंकाळपर्यंत कामकाज करताना दिसून आले. सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपातील कर वसुली विभाग, लेखा विभागात कर्मचारी कामात व्यस्त दिसून आले. आर्थिक वर्षाचा शेवट अन्् कामाचा ताण ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत सर्व व्यवहार पूर्ण करावे लागणार आहेत. विविध विकासकामांचा कोट्यवधींचा निधी खर्च करण्यासाठी प्रशासनाची कसरत सुरू आहे. आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने कामाचा ताण अधिक आहे. कोणताही निधी शासन दरबारी परत जाऊ नये आणि विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी सर्व कर्मचारी सुटीच्या दिवशीही काम करताना दिसून आले. निधी वेळेत खर्चित झाला नाही तर तो परत शासनाकडे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तो वेळेत खर्च दाखवण्यासाठीही मोठी धडपड सुरू आहे.
हिरपूर येथे आजपासून जयाजी महाराज यात्रा:पाच बैलगाड्या एकाच वेळी ओढण्याची परंपरा
तालुक्यातील हिरपूर येथे जयाजी महाराज यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांद्वारे पाच बैलगाड्या एकाच वेळी ओढण्याची परंपरा आहे. महोत्सव सोमवार, ३० मार्च रोजी होत आहे. अनेक संत महात्मे यांचा वास तालुक्यातील हिरपूर येथे लाभलेला आहे. श्री. जयाजी महाराज हे भाविकांचे श्रध्दास्थान आहे. त्यांचा यात्रा महोत्सव दरवर्षी एप्रिल महिन्याच्या चैत्र शुद्ध तिथीला यात्रा साजरा केला जातो. यात्रेनिमित्त सासुरवाशीन मुली प्रामुख्याने उपस्थित राहतात. या दिवशी संपूर्ण गावामध्ये प्रत्येकाच्या घरी रोडग्याचा महाप्रसाद तयार केला जातो. विशेष म्हणजे या यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे पाच बैलगाड्या एकाच वेळी ओढण्याची परंपरा आहे. मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविक सात दिवस उपवास करतात व बैलगाड्या ओढतात. या बैलगाड्यांमध्ये साधारणतः १०० ते १५० भक्त बसतात होतात. इतिहासानुसार हिरपूर येथे जयाजी महाराजांचे भक्तिपूर्ण कार्य मोठ्या प्रमाणात झाले आहे. पूर्वी गावामध्ये बलंग (बंलग) घराणे वास्तव्य करत होते. त्यांच्याच घराण्यात सदाजी व गिरजाबाई दांपत्याच्या पोटी जयाजी महाराजांचा जन्म झाला. बालपणापासूनच धार्मिक संस्कार झाल्याने त्यांची भक्तीभावना दृढ होती. वयाच्या बाराव्या वर्षी गुरे चारताना त्यांना महादेवाविषयी विशेष श्रद्धा निर्माण झाली. कुंभमेळ्याच्या पर्वावर जयाजी महाराजांनी त्रिशूळ घेऊन पायी वारी केली. सोनाजी उंबरकर यांनी देखील चार वर्षे महादेवाची काठी घेऊन पायी वारी केली. त्यानंतर मंडई स्तवन गायनाची परंपरा सुरू झाली. दौलतराव उबंरकर व त्यांच्या वंशजांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. वीस वर्ष वयात त्यांनी शिखर शिंगणापूर येथे पायदळ यात्रा केली. हिरपूर येथील देवस्थानाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणत्याही देवाची मूर्ती किंवा छायाचित्र नाही. केवल त्या जागेचे दर्शन घेतले जाते. यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.
‘शहरासह जिल्ह्यात गॅस सिलिंडरची टंचाई नाही, असे प्रशासन कितीही सांगत असले तरी आम्हाला दररोजच्या बुकिंग मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा होत आहे. तोही दोन दिवसाआड होत असल्याने नागरिकांना सिलिंडर वितरीत करण्यास विलंब होत आहे. त्यातूनच शहरातील सर्वच गॅस एजन्सीसमोर सकाळपासूनच ग्राहकांच्या रांगा लागत आहे’, अशी कैफियत शहरातील गॅस एजन्सीधारकांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार साजिद खान पठाण यांच्यासमोर मांडली. विलंबाने तोही कमी प्रमाणात सिलिंडर पुरवठा होत असल्याने शहरातील गॅस एजन्सीकडे बुकिंगनंतर दहा ते बारा दिवसांचे वेटिंग असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. यामुळे सिलिंडरचा पुरेसा साठा असल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरवला आहे. ही वेळ शासनाने आणली : आ. साजिद पठाण गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा आहे. अशी खोटी आकडेवारी पुरवठा विभाग दाखवत आहे. वितरकांना पुरेसा साठा दिला तरच ते वाटप करतील. आतापर्यंत एकाही वितरकाने सिलिंडरचा काळाबाजार केल्याची तक्रार नाही. मग गॅस एजन्सींना दोष कसा देणार?, प्रशासन जनतेला पॅनिक होऊ नका, असे आवाहन करत आहे. जनता पॅनिक झाली नाही. प्रशासनाने जनतेवर ‘पॅनिक’ होण्याची वेळ आणली’, असे काँग्रेसचे आमदार साजीदखान पठाण यांनी रविवारी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. जीवनावश्यक असे गॅस सिलिंडर देण्यास हे शासन असमर्थ ठरले आहे. प्रशासनाने पुरेसे सिलिंडर उपलब्ध करुन द्यावे, असे आदेश दिले, असेही आ. पठाण म्हणाले. पूर्वी २१ दिवसांच्या नियमाने बुकिंग होते. ते नव्या नियमामुळे २५ दिवसांवर गेले. तसेच रोज एका एजन्सीकडे पूर्वी १०० ते १५० सिलिंडरची बुकिंग व्हायची ती आता तिपटीने वाढून ४०० ते ४५० झाली. तुलनेत दैनंदिन पुरवठा हा ३०० ते ३६० होत आहे, तोही दोन दिवसाआड. याचा परिणाम सिलिंडर वितरणावर झाला. परिणामी सिलिंडर वितरणाची साखळी विस्कळीत झाली. शिवाय ऑनलाइन गॅस बुकिंग केल्यानंतर आधीचे बुकिंग क्लिअर करण्यासाठी काही दिवसांचा प्रतीक्षा कालावधी लागतो, याची ग्राहकांना कल्पना नाही. म्हणून गॅस बुकिंग केल्यानंतर लागलीच सिलिंडर मिळावे, असा अनेकांचा आग्रह असतो. त्यासाठी अनेकजण रांगेत लागतात.
बेरोजगार असल्यामुळे हातपाय न गाळता काहीतरी वेगळे करण्याच्या निर्धाराने झपाटलेल्या सात तरुणांनी सहा वर्षांच्या संघर्षानंतर आता कुठे यश मिळवले असून, युवा बेरोजगार टी-स्टॉलने दर्यापूर शहर व तालुक्यात नवी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा हा प्रेरणादायी लघू उद्योग प्रवास अन्य बेरोजगारांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. तालुक्यातील शिवर येथील चेतन वाघमारे या युवकाने बेरोजगारीचा बाऊ न करता स्वतःच्या जिद्दीने यशस्वी व्यवसाय उभा करत अन्य बेरोजगारांपुढेही एक उदाहरण ठेवले आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांनी दर्यापूर शहरात युवा बेरोजगार या नावाने चहा व कॉफी स्टॉल सुरू केला होता. या वेगळ्या नावामुळे सुरुवातीला शहरवासीयांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. युवा बेरोजगार या नावावरून अनेकांनी विनोद केले, चर्चा रंगल्या. मात्र, चेतन वाघमारे यांनी या सर्वांकडे दुर्लक्ष करत ग्राहकांना दर्जेदार चहा- कॉफी देण्यावर भर दिला. हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद वाढत गेला आणि या व्यवसायातून त्यांना स्थिर आर्थिक उत्पन्न मिळू लागले. स्वतःच्या पायावर उभे राहताना चेतनने इतर बेरोजगार युवकांनाही सोबत घेतले. सद्यःस्थितीत चेतनच्या मार्गदर्शनात एकूण सात तरुणांची टीम तयार झाली असून, चहा कॉफीबरोबरच नाश्ता व सीट कव्हर अशा विविध व्यवसायांपर्यंत त्यांनी विस्तार केला आहे. या उपक्रमातून चांगली उलाढाल होत असून, अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. लाथ मारेल तिथे पाणी काढणार अशी ओळख निर्माण करणाऱ्या वाघमारे कुटुंबियांच्या या यशोगाथेची सध्या शहरात चर्चा सुरू आहे. बेरोजगारीवर मात करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या तरुणांचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. चेतन वाघमारे,राहुल वाघमारे,ओम वाघमारे,रोहित इंगळे,महेश कराळे,श्याम सावरकर, आनंद शेलोकार,रामेश्वर मेसरे,सारंग कुरील या युवकांनी बेरोजगारी वर मात करत जागेच्या अभावी त्यांच्या संकल्पनेतील व्यवसाय सुरुवात होण्याला थोडा विलंब होत आहे. यांची वास्तविकतः अशी की पहाटे सहा ते सायंकाळी सहा पर्यंत व्यवसाय सुरू असून, स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष होत आहे.भल्या पहाटेपासूनच ग्राहकांच्या लांबच लांब रांगा चहा-कॉफी नाश्त्याच्या गाडीवर दिसत आहेत. संपूर्ण एक कट्टा पोहे दिवसभर त्यांना लागतात. शंभर लिटरच्या वर दुधाची त्यांची मागणी आहे. चहा- कॉफीला स्वतःच्या घरगुती म्हशीचे दूध ते वापरत असून, पूर्णपणे नैसर्गिकरित्या चहा, कॉफी, नाश्ता ते ग्राहकांना देण्यावर भर देत आहेत. एकंदरीत बघता या युवकांचा आदर्श इतरही बेरोजगार युवकांनी घेतल्यास बेरोजगारीवर मात मिळवणे शक्य होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.
येथील मध्यवर्ती कारागृहात श्री भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने बंदीजनांची आरोग्य तपासणी करून औषधाचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम दिगंबर जैन महासमितीचे विदर्भ अध्यक्ष अभिनंदन पेंढारी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्या वतीने अतिरिक्त अधीक्षक विलास भोईते तर प्रमुख अतिथी डॉ.संदीप, डॉ. हितेश गुल्हाने, डॉ. स्वानंद लुंगे, डॉ. जी. बी. चरपे, अभिनंदन पेंढारी, दिगंबर जैन महासंमितीचे उपाध्यक्ष उल्हास क्षीरसागर,प्रशांत गडेकर, शितल सिंघवी,मनीष नानोटी, एमआर मंगेश जांभुळकर, डॉ. मोहमद राजिक उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाचे आयोजक अभिनंदन पेंढारी यांनी प्रास्ताविकातून श्री भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवा निमित्त जैन समाजाच्या वतीने धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यातून भगवान महाविरांचे विचार प्रत्येका पर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाते. भगवान महावीरांनी मानवाला जगा आणि जगू द्या हा संदेश दिला. त्यानुसार प्रत्येकाने त्यांचे विचार आचरणात आणून सुखसमाधानाने जगतांना इतरांना त्याच पद्धतीने जगता यावे, अशी भावना ठेवावी,असे सांगितले. या नंतर सर्व अतिथीचे स्वागत पेंढारी यांनी केले. सर्व उपस्थितांनी सबोधित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिरिक्त अधीक्षक विलास भोईते यांनी दिगंबर जैन महासमितीचे पेंढारी यांनी कारागृहात बंदीजनांसाठी आरोग्य तपासणी व औषधी वाटप करण्याचा सेवाभावी उपक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देत ही उपयोगी बाब असल्याचे म्हटले. पेंढारी यांनी कारागृहात आजवर अनेक उपक्रम राबवले आहेत. गुरु महाराजांचे प्रवचन, उपदेश, रोग निदान शिबिरे, प्रबोधन आदी कार्यकम केले आहेत. यातून शहरातील नामांकित वैद्यकीय तज्ञ डॉक्टरांनी येऊन बंदीजनांची तपासणी केल्याबद्दल भोईते यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन पेंढारी यांनी केले तर आभार उल्हास क्षीरसागर यांनी मानले. या वेळी अंकुश कळसकर, ऋषीकेश काळे, संतोष राव, निकिता काळे, चेतन कडू व कारागृहातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना (२५७/८९) अमरावती यांच्या वतीने आयोजित आरोग्य कर्मचाऱ्यांचा मेळावा २०२६ नुकताच कर्मयोगी गाडगे महाराज मंदिर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात झाला. कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॅग्मो संघटना अमरावतीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शिरसाट होते.या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पूनम मोहकार, डॉ. स्वप्निल मालखेडे, डॉ. सुमित राऊत, डॉ. शरद जोगी तसेच जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष गौरव काळे उपस्थित होते. या वेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेले संघटनेचे पदाधिकारी तसेच महिला व पुरुष आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष चंदू काळे यांनी केले. त्यांनी मेळाव्याच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करत संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासनाकडे करण्यात येत असलेल्या पाठपुराव्याची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली. या वेळी मार्गदर्शन करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी सांगितले की, आरोग्य विभागात सध्या विविध नवीन योजना व कार्यक्रम राबवले जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कोणत्याही कामाचा अनावश्यक ताण न घेता योग्य नियोजन करून काम करावे व स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रशासकीय दिरंगाईमुळे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे काम प्रलंबित राहणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. त्या सर्वांचे संघटनेच्या वतीने अध्यक्ष काळे व महिला हक्क संरक्षक पुष्पा वानखेडे यांनी आभार मानले.
श्री शिवाजी शिक्षण संस्था अंतर्गत श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे शैक्षणिक २०२५–२६ चा पदवी-गुणगौरव सोहळा व पदवी वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या सोहळ्यास विद्यार्थी,पालक,शिक्षक व मान्यवरांची उपस्थिती लाभली. शुभम ब्रम्हटेके, साक्षी फाले, पायल खोब्रागडे या विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमात सुवर्ण,रौप्य पदके तसेच रोख रक्कम, स्मृती चिन्ह पारितोषिके प्राप्त केली. तुकडी २०२४ ते २६ मधील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून रुपम सोनोने याने डॉ. अविनाश असनारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्याद्वार दिले जाणारे सुवर्ण पदक प्राप्त केले. तर उत्कृष्ट विद्यार्थीनी म्हणून पूनम जंवजाळ हीने महाविद्यालयातील सेवा निवृत्त ज्येष्ठ लिपीक राजेन्द्र वानखडे यांच्या मार्फत दिले जाणारे सुवर्ण पदक पटकावले.स्व. मधुकरराव कृष्णराव देशमुख उत्कृष्ट वाचक पुरस्कार महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. माधुरी देशमुख यांच्या मार्फत पुस्तक रुपाने दिल्या जाणारा पुरस्कार रुपम सोनोने व वैष्णवी खलोकार या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष केशव मेतकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी विभाग प्रमुख डॉ. सुरेश विधळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यापीठ गीत व डॉ. भाऊसाहेब देशमुख यांचे गौरव गीत सादर करण्यात आले.प्राचार्य डॉ. विनय राऊत यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात डॉ. किशोर क्षत्रिय यांनी पारितोषिक दानदात्यांची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे व विविध पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रभाकर फुसे, अशोक अर्डक, सूर्यप्रकाश मावरे, मोहन देशमुख, आनंद देशमुख, सहदेव अर्डक,सुरेश सोलव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडत समाजात आदर्श नागरिक म्हणून कार्य करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात मा. केशवराव मेतकर यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी व्यासपीठ वर दानदाते प्रा.अशोक घोगरे,प्रा.अनिल कोहळे,डॉ अंजली ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. माधुरी देशमुख यांनी तर आभार सचिन काळपांडे यांनी केले.या सोहळ्यास शिक्षकवृंद प्रा .डॉ वनिता काळे,प्रा.डॉ. संगीता बिहाडे, डॉ. अमित गावंडे,डॉ. वैशाली कडू,डॉ. शिल्पा येळणे,डॉ. सुकेश्वनी घोडेस्वार, मनीषा लकडे, शिक्षकेतर कर्मचारी राजू जामनिक, सुनीता गावंडे,संजय बोबडे,चालू सत्रातील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रम शिस्तबद्ध,प्रेरणादायी व विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा ठरला. माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी दृढ नाते ठेवणे गरजेचे : प्रा. सी.डी. देशमुख श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय, अमरावती येथे शुक्रवारी २७ मार्च रोजी दुपारी २ वाजता माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात झाला. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलसचिव तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य प्रा. सी.डी. देशमुख यांनी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी दृढ नाते ठेवत महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी सहकार्य करणे गरजेचे आहे, असे मत याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शशांक देशमुख होते. सदस्य प्रा. डॉ. शिवाजी देशमुख ,शिवाजी शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय राऊत, डॉ. वनिता काळे, डॉ. किशोर क्षत्रिय, डॉ. संजय खडसे उपस्थित होते. मेळाव्यात विविध माजी विद्यार्थी मनिषा रहाटे यांनी आपल्या अनुभवांना उजाळा देत महाविद्यालयीन आठवणी कथक केल्या.तसेच सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत करिअरविषयक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे दीपाली गोंडेकर व सम्यक बोरकर यांना प्रा.सी.डी.देशमुख यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. अक्षय बनसोड डॉ. अंजली ठाकरे यांच्या हस्ते शिष्यवृत्ती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी सर्व विद्यार्थी-विद्यार्थ िनी, माजी विद्यार्थी-विद्यार्थ िनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या मेळाव्यामुळे माजी विद्यार्थी आणि महाविद्यालय यांच्यातील संबंध अधिक दृढ होऊन एक स्नेहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
दिव्य मराठी इनसाइड स्टोरी:शहरामध्ये तीन महिन्यानंतर मिळणार ‘पीएनजी’;‘एलपीजी’ला सक्षम पर्याय
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम देशासह आपल्या शहरातसुद्धा जाणवायला लागला आहे. त्यामुळे एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान शहरात आगामी तीन महिन्यानंतर एलपीजीला सक्षम पर्याय म्हणून ‘पीएनजी’ (पाइप नॅचरल गॅस) उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील सुमारे ४ ते ५ हजार घरांमध्ये ‘पीएनजी’ मिळण्याची शक्यता असून. त्यासाठी सद्या युद्धस्तरावर तयारी सुरू झाली आहे. अदाणी टोटल गॅसद्वारे अमरावतीकरांना ‘पीएनजी’चा पुरवठा करण्यात येणार आहे. ‘पीएनजी’चा पुरवठा नांदगाव खंडेश्वर लगतच्या बोरी येथील मदर स्टेशनवर करण्यात येईल. त्यामुळे बोरी ते अमरावती अशी वायु वाहिनी टाकण्याचे काम सुरू असून, सद्या ही वायुवाहीनी अमरावती ते बडनेरा जुना बायपास मार्गावरील एमआयडीसीपर्यंत पोहोचली आहे. येणाऱ्या तीन महिन्यात बडनेरा व दस्तुरनगर भागात नागरिकांच्या घरांपर्यंत अंतर्गत वायूवाहिनी टाकण्याचे काम कंपनीकडून करण्यात येईल. कारण हा गॅस पुरवठा करण्यासाठी उर्वरित. पान ४ बोरीपासून अमरावती शहरापर्यंत सुमारे ४० किलोमीटर वायुवाहिनी टाकण्याचे काम सहा महिन्यांपुर्वीच सुरू झाले होते. या मार्गात काही ठिकाणी वनविभागाची व इतर विभागांची परवानगी कंपनीला घेणे आवश्यक आहे, त्या परवानगींसाठी दीर्घ काळ लागत होता. मात्र आता देशात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता कोणत्याही परवानगीसाठी वेळ लागणार नाही. संबधित विभागाला माहिती देवून कंपनीला वायुवाहिनीसाठी काम करता येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत झपाट्याने काम पूर्ण करण्याचे आदेश कंपनीला केंद्र सरकारने दिले असल्याची माहिती अदाणी टोटल गॅसचे अधिकारी योगेश पारधी यांनी दिली आहे. बडनेरा, दस्तूरनगराला देण्यात येणार प्राधान्य जुलै महिन्यापर्यंत बडनेरा व दस्तुरनगर भागातील नागरिकांच्या घरी ‘पीएनजी’ पोहोचवण्याचा कंपनीचा शंभर टक्के प्रयत्न आहे. तसेच येत्या सहा महिन्यात शहरातील आणखी काही भागात ‘पीएनजी’ पोहोचणार आहे. ‘पीएनजी’ वापरणाऱ्या ग्राहकांकडे मीटर लावण्यात येईल, वापराप्रमाणे तसे पैसे ग्राहकांना भरावे लागणार आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा सोमवारी पहाटे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ते नागपूरहून विमानतळाकडे निघाले असताना हा अपघात घडला. नागपूर जिल्ह्यातील हल्दीराम परिसरात त्यांच्या गाडीला एका ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका जबर होता की, कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. मात्र सुदैवाने खासदार पडोळे या अपघातातून बचावले. प्राथमिक माहितीनुसार, प्रशांत पडोळे हे पहाटे सुरक्षारक्षक आणि चालकासह नागपूर विमानतळाकडे रवाना झाले होते. याचदरम्यान, अचानक आलेल्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असले, तरी खासदार पडोळे किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातानंतरही त्यांनी धैर्य दाखवत प्रवास सुरू ठेवला. त्यांनी एका दुचाकीस्वाराची मदत घेत नागपूर शहर गाठले आणि तेथे प्राथमिक उपचार घेतले. उपचारानंतर त्यांनी आपला पुढील दौरा रद्द न करता थेट नागपूर विमानतळ गाठले. त्यानंतर नियोजित कार्यक्रमानुसार ते दिल्लीकडे रवाना झाले. अपघाताच्या वेळी त्यांच्या सोबत असलेल्या सुरक्षारक्षक आणि चालकाची प्रकृती स्थिर असल्याचेही समजते. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती. अपघात नेमका कसा घडला, याचा तपास स्थानिक पोलिस करत आहेत. सलग दोन अपघातांमुळे त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न दरम्यान, ही पहिली वेळ नाही की खासदार पडोळे अपघातातून बचावले आहेत. यापूर्वीही काही महिन्यांपूर्वी नागपूरमध्येच त्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. त्या वेळीही ते किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे सलग दोन अपघातांमुळे त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यामागील कारणांचा तपास होणे आवश्यक असल्याची चर्चा सुरू आहे.
श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्थेच्या वतीने भगवान महावीर यांचा सोलापूरसह सात जिल्ह्यांचा २६२५ वा सामूहिक जन्मकल्याणक प्रभावना महोत्सव अकलूज येथे दि. ४ व ५ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू असून सोहळ्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील ५ हजारहून अधिक जैन बांधव एकत्रित येऊन विचार मंथन होणार असल्याचे दलाचे संस्थापक अध्यक्ष व भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मिहीर गांधी यांनी पापरी येथे दिली. सदर महोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी जैन धर्मीयांशी संवाद साधण्यासाठी गांधी आले होते, त्यावेळी त्यांनी माहिती दिली. जैन समाजाच्या प्रभावनेसोबतच ग्रामीण शहरी भागातील जैन बांधवांतील वैचारिक, धार्मिक दरी कमी व्हावी,त्यांच्यातील समस्या, वर्तमान व भविष्यातील अडचणी यावर विचार मंथन करण्यासाठी सन्मती सेवा दलाकडून गत १३ वर्षांपासून दरवर्षी एका ठिकाणी सात जिल्ह्यांचा एकत्रित भगवान महावीर जन्मकल्याणक प्रभावना महोत्सव साजरा केला जातो. चालू वर्षीचा प्रभावना महोत्सव अकलूज येथे होणार असून त्याची युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे. सोलापूरसह सातारा, पुणे, धाराशिव, अहिल्यानगर, शनिवार दि. ४ एप्रिल व रविवार दि. ५ एप्रिल रोजी दोन दिवस हा महोत्सव सुरू राहणार असून यासाठी दिगंबर जैन मुनी भक्तामर महोदधि प.पू. उच्चारणाचार्य श्री १०८ विनम्रसागरजी यांचा ११ पिंछी ससंघ व नांदणी मठाचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी तसेच कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांचे मंगल सानिध्य लाभणार आहे. दोन दिवस हा जन्मकल्याणक प्रभावना महोत्सव साजरा होणार असून शनिवारी दुचाकी रॅली, जिनसेन भट्टारक स्वामी यांचा जन्मदिन, मंगल आरती, सांस्कृतिक आरती आदी कार्यक्रम होणार आहे तर रविवारी मुख्य कार्यक्रम लीलावती मंगल कार्यालय येथे असून, महावीर पथ येथे ध्वजारोहण करत शोभायात्रा निघणार आहे. बीड व मुंबई या सात जिल्ह्यातील ५ हजार हुन अधिक जैन धर्मीय बांधव एकत्रित येऊन धर्मलाभ घेणार आहेत. सदर महोत्सव यशस्वी होण्यासाठी अकलूज येथील सकल जैन समाज, जैन महिला मंडळे, सन्मती सेवा दलाचे विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळ, सर्व माजी अध्यक्ष हे परिश्रम घेत आहेत. असे असेल आयोजन, ध्वजारोहण करत शोभायात्रा
चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा रविवार (दि. २९ मार्च ) रोजी लाखो वैष्णव भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. उन्हाचा पारा वाढलेला असतानाही भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी रांगेत १० हजाराहून अधिक भाविक उभे असून ही रांग रिद्धी-सिद्धी पत्राशेडपर्यंत पोहोचली आहे. संपूर्ण पंढरपूर शहर, ६५ एकरचा भक्तिसागर परिसर, चंद्रभागा वाळवंट, शहरातील मठ आणि मंदिरे भाविकांच्या गर्दीचे, हरिनामाच्या जयघोषाने, टाळ, मृदंगाच्या गजराने दुमदुमून गेलेली आहेत. उन्हाच्या झळा, इंधन टंचाईचे सावट असतानाही वारी पोहोचवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल भक्त दाखल झाले आहेत. एकादशीनिमित्त दोन दिवसात शहरातील विविध भागात शेकडो दिंड्या आणि पालखी सोहळे दाखल झालेले आहेत. रविवारी पहाटेपासून या पालख्या, दिंड्यानी चंद्रभागा स्नान आणि नगर प्रदक्षिणेसाठी परंपरेनुसार प्रस्थान ठेवले होते. चंद्रभागा नदीत स्नान केल्यानंतर भाविक महाद्वार घाटावरून मंदिराकडे येत होते, संत नामदेव महाराज समाधी स्थळी वारी पोहोचवून मंदिर प्रदक्षिणा करून परत जात होते. नगर प्रदक्षिणा घालून दिंड्या आणि वारकरी आपापल्या ठिकाणी परत गेले. सूर्यफूल, झेंडू शेवंतीने गाभाऱ्याची सजावट सजावटीसाठी सनफ्लॉवरची ११,००० फुले, पिवळा झेंडू १०० किलो, केशरी झेंडू १०० किलो, पांढरी शेवंती १०० किलो अशा विविध फुलांचा वापर २० कारागिरांच्या मदतीने केली आहे. पुणे येथील शकुंतला फ्लॉवर मर्चंटचे संचालक राजेंद्र पंढरीनाथ नाईक यांनी विनामूल्य केली. मंदिरे समिती सदस्यांच्या हस्ते पहाटे चार वाजता नित्यपूजा पार पाडली श्री विठ्ठल -रुक्मिणी मातेची नित्यपूजा रविवारी पहाटे ४ वाजता विठ्ठलाची पूजा मंदिर समिती सदस्य ह.भ.प. प्रकाश जवंजाळ व रुक्मिणी मातेची पूजा संभाजी शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक भक्तिभावाने संपन्न झाली. यावेळी मंदिर समिती सदस्या शकुंतलाताई नडगिरे, सल्लागार परिषद सदस्य सुनील रुकारी, प्रभारी व्यवस्थापक संदेश भोसले आदी उपस्थित होते. चौकाचौकात वाहतुकीची कोंडी, वाहनांच्या लांब रांगा शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौक, सरगम चौक, स्वा. सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, मेकॅनिक चौक ते अहिल्या पुलापर्यंत आणि बायपास मार्गावर आणि पाणी पुरवठा पंपिंग स्टेशनपर्यंत जागोजागी सतत वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून आपले. सुमार एक ते दीड किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
पुण्यातील कथित भोंदूबाबा प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत असून स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचा दावा करणारा आरोपी ऋषिकेश वैद्य आता पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वसईमध्ये झालेल्या एका बैठकीत मोठा वाद होऊन मारहाणीची घटना घडल्याचे उघड झाले आहे. पीडित महिला, तिचा पती आणि आमची वसई संस्थेचे सदस्य यांच्यात चर्चा सुरू असताना हा वाद चिघळला आणि वातावरण तणावपूर्ण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, 29 ऑक्टोबर रोजी वसईतील हयात बंगल्याजवळ ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आरोपी ऋषिकेश वैद्य मागील दोन वर्षांपासून पीडित महिलेशी फोन आणि मेसेजद्वारे संपर्कात होता. या पार्श्वभूमीवर पीडितेचा पती अत्यंत संतप्त होता. चर्चेदरम्यान वाद वाढत गेला आणि संतापाच्या भरात पतीने थेट आरोपीवर हल्ला केला. या वेळी उपस्थित असलेल्या आमची वसई संस्थेचे सदस्य अश्विन ठठेरा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर अश्विन ठठेरा यांनी 20 ऑक्टोबर 2025 रोजी वसई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 115(2), 351(2) आणि 352 नुसार पीडितेच्या पतीविरोधात एनसी (नॉन-कॉग्निझेबल) गुन्हा नोंदवला. पोलिसांनी त्याला समज देत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू ठेवली आहे. या प्रकरणामुळे आधीच गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणाला आणखी एक वेगळं वळण मिळालं आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुरुवात वसई येथे झाली होती, मात्र पुढील तपासासाठी ते पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपी ऋषिकेश वैद्यचा शोध सुरू केला होता. अखेर पिंपरी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. तो एका गाडीतून आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी पुण्यात येत असताना पोलिसांना त्याची माहिती मिळाली आणि त्याला अटक करण्यात आली. आता त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. फोटो काढून धमकावल्याचाही संशय पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, 2023 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून आरोपी आणि पीडित महिलेची ओळख झाली होती. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये आरोपी पुण्यात आला आणि स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचे सांगत महिलेला फसवले. त्याने तिला ‘पार्वती’ असल्याचा दावा करत पुण्यातील मांजरी भागातील एका लॉजमध्ये नेले. तेथे तिला काही मादक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच तिचे फोटो काढून धमकावल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
शिक्षक हा ज्ञानी असतो म्हणूनच तो शिक्षक असतो, तो संयमी , उत्साही आणि विद्यार्थ्यांच्या भावना विद्यार्थ्यांच्या मनातील कौशल्य समजून घेऊन त्या कौशल्याला व्यासपीठ निर्माण करून देणारा, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा तोच खरा आदर्श शिक्षक असतो, असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले. ते पंचायत समिती शिक्षण विभाग मंगळवेढा यांच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून जोगेश्वरी मंगल कार्यालयात बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सभापती दिपाली ताड होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन आमदार समाधान आवताडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जीप सदस्य प्रदीप खांडेकर, उपनगराध्यक्ष येताळा भगत, माजी उपसभापती अर्जुन मल्हाळे, पंचायत समिती सदस्य विनायक यादव, उद्योजक हनुमंत शेठ दुधाळ, जिल्हा परिषद सदस्या करुणा शिवशरण, गटविकास अधिकारी विजयकुमार देशमुख, नगरसेवक अजित जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार आवताडे म्हणाले की, विद्यार्थ्यांना जिज्ञासा निर्माण करणे, प्रोत्साहित करणे, प्रयत्न केले पाहिजे. बऱ्याच शिक्षकांच्या अंगी एक गुण असतो म्हणून सगळ्यांनाच पुरस्कार मिळतो असे नाही. यावर्षी एकाला तर पुढच्या वर्षी दुसऱ्याला शाळा झगमगती असली की आपण शाळा चांगली म्हणतो, ग्राउंड चांगले असले चांगले म्हणतो. परंतु त्या ठिकाणी ज्ञानदान किती होते, त्या शाळेची गुणवत्ता काय आहे, हे आपण सगळे न बघता कॉन्व्हेंट स्कूलला महत्व देत आहोत, हे चुकीचे आहे. चार विद्यार्थी सैनिक स्कूलला तर ५ विद्यार्थी नवोदयाला एकाच वर्गातील विद्यार्थी पात्र झाल्याबद्दल जिल्ह्यात आतापर्यंत असे कधीच घडले नाही म्हणून ज्योती कलूब्रम्हे यांचे आमदार आवताडे यांनी अभिनंदन व कौतुक केले. दुसऱ्याला मिळणार आहे. सभापती दिपाली ताड म्हणाल्या की, शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश टाकतात ज्ञान संस्काराने परिपकवता घडवतात असे सांगून तालुक्यातील वाड्या वस्तीतील शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमात जि. प सदस्य प्रदीप खांडेकर, पंचायत समिती सदस्य जयश्री कवचाळे यांनी विचार व्यक्त केले. यावेळी शिक्षक नेते सुरेश पवार, संजय चेळेकर यांच्यासह तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन केंद्रप्रमुख मारुती काळुंगे यांनी प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता यांनी तर आभार डॉ. बिभीषण रणदिवे यांनी मानले. ५ विद्यार्थी नवोदय परीक्षेत ठरले पात्र
बेदाणा दर वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा:94 वरून थेट 796 एकर, माढा तालुक्यात द्राक्ष लागवडीत मोठी झेप
माढा तालुक्यात यंदा बेदाणा उत्पादनाला चांगली गती मिळाली आहे. सध्या बाजारात बेदाण्याला प्रतिकिलो ३५० ते ४२५ दर मिळत असून शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. द्राक्षाचे उत्पादन कमी असले तरी बेदाणा दर पुढील काही दिवसांत अजून वाढतील. कमी उत्पादन असूनही चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित काही प्रमाणात सावरले आहे. सन २०२४- २५ मध्ये सुमारे ९४ एकरांवर असलेले द्राक्ष क्षेत्र यंदा २०२५- २६ मध्ये तब्बल ७९६ एकरांपर्यंत वाढले असून माढा तालुक्यात द्राक्ष लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल स्पष्ट दिसून येतो. द्राक्ष विक्रीपेक्षा बेदाणा तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून स्थानिक बाजारासह पुणे, मुंबई आणि इतर राज्यांतही माढा तालुक्यातील बेदाण्याची मागणी चांगली आहे. बेदाणा प्रक्रियेसाठी लागणारी मजुरी, वीज व इतर खर्च वाढले असले तरी सध्याच्या दरामुळे शेतकऱ्यांना नफा मिळत आहे. काही प्रगतिशील शेतकरी निर्यातक्षम दर्जाचा बेदाणा तयार करण्यावर भर देत असून त्यातून अधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील ७- ८ दिवसांपासून शेतकऱ्यांनी वातावरणाबाबत काळजी व्यक्त केली असून त्यांनी सांगितले की वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने बेदाणा वाळवताना नुकसान होऊ नये आणि हवामान बदलू नये, ही अपेक्षा वक्त करत आहेत बेदाण्याच्या दरावर परिणाम होणार का जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे बेदाण्याच्या दरात चढ-उतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरवठा कमी झाला किंवा वाहतुकीवर परिणाम झाला, तर बेदाण्याचे दर वाढू शकतात.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज हे केवळ जैन समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण मानवतेचे श्रद्धास्थान होते. त्यांच्या सेवेचा आणि त्यागाचा वारसा 'जय आनंद महावीर युवक मंडळ' अतिशय निष्ठेने पुढे चालवत आहे. मंडळाने रौप्य महोत्सवी वर्षातही अन्नदान आणि रक्तदानाचा जो उपक्रम राबवला, तो खऱ्या अर्थाने आचार्यश्रींना दिलेली मोठी श्रद्धांजली आहे, असे प्रतिपादन उद्योजक मोहनलाल मानधना यांनी केले. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या ३४ व्या पुण्यस्मृतीनिमित्त नवी पेठ येथे मंडळाच्या वतीने आयोजित 'महाप्रसाद' भोजनाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. आमदार संग्राम जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, ग्राहक भांडारचे चेअरमन विक्रम फिरोदिया, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे आशाताई डागवाले, माजी महापौर भगवान फुलसोंंदर, मनोज लोंढे, सेक्रेटरी आनंद मुथा, उपाध्यक्ष कुंतीलाल राका, कार्याध्यक्ष सत्येन मुथा, अजित गांधी, चेतन गुगळे आदींसह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांनी प्रास्ताविकात सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. पुरी-भाजी, मसालेभात आणि गोड बुंदी असा रुचकर बेत होता. उन्हाचा कडाका लक्षात घेऊन भाविकांसाठी कूलर्स आणि थंड पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती. केवळ मंडपातच नव्हे, तर शहरातील अनाथालये आणि अपंग संस्थांमध्येही मंडळाच्या वतीने भोजन पोहोचवण्यात आले. जय आनंदचा जयघोष आणि 'डाळरोटी खाओ, प्रभू के गुण गाओ' या प्रार्थनेने परिसर भक्तीमय झाला होता. मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आचार्यश्रींच्या संस्कारांचे पालन करत हा सोहळा यशस्वी केला. आभार मनोज गुंदेचा यांनी मानले. अन्नदानातून मिळणारे पुण्य सर्वात मोठे अन्नदानातून मिळणारे पुण्य सर्वात मोठे पुण्य असते. जय आनंद महावीर युवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीदिनी दरवर्षी अन्नदान करण्याचा उपक्रम राबवित आहेत. आचार्यश्रींची मानवतेची, सेवेची शिकवण मंडळ चांगल्या पध्दतीने अंमलात आणत आहे, असे उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले.
शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांत सध्या मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, नागरिकांचे रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. गेल्या काही दिवसांत कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुले आणि वृद्ध जखमी होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेकडील नोंदीनुसार महिनाभरात सुमारे चार हजार जणांवर कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी प्रशासनाच्या उपाय योजना कागदावर राहिल्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कुत्र्यांना आवरा, असे म्हणण्याची वेळ सामान्य नागरिकांवर आली आहे. शहरातील सावेडी, माळीवाडा, केडगाव आणि उपनगरांमध्ये रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे धावत असल्यामुळे अपघातांची भिती आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांचे कळप रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून बसलेले असतात. रात्री कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांना आणि पहाटे फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या कुत्र्यांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. केवळ शहरातच नव्हे, तर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव आणि राहुरी सारख्या तालुक्यांच्या ठिकाणीही हीच परिस्थिती आहे. या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मनपा आणि स्थानिक प्रशासनाकडून 'ॲनिमल बर्थ कंट्रोल' अंतर्गत कुत्र्यांची नसबंदीसारख्या उपाय योजना राबवल्या जातात. ही मोहिम सुरू असली तरी रस्त्यावरील कुत्र्यांची संख्या कमी झाल्याचे दिसत नाही. प्रत्यक्षात ही मोहीम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यांची आक्रमकताही वाढली आहे. उघड्यावर पडणारा कचरा आणि मांस विक्रीच्या दुकानाबाहेरील अवशेष यामुळे कुत्र्यांचे टोळके एकाच ठिकाणी जमा होतात, ज्यामुळे परिस्थिती अधिक बिकट होत आहे. महिनाभरातील श्वानदंश घटना अहिल्यानगर ३७५, अकोले १०३, जामखेड ६०, कर्जत १८६, कोपरगाव ३२७, नेवासे ३८२, पाथर्डी ३०१, पारनेर २६५, शेवगाव १६१, राहाता २४९, राहुरी ३५६, राहुरी ३५६, संगमनेर ३५३, श्रीगोंदे २८३ तर श्रीरामूर तालुक्यात ४३० जणांना कुत्र्याने चावा घेतला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे श्वानदंशाच्या नोंदी आहेत. त्यासाठी मुबलक प्रमाणात रेबीज प्रतिबंधक लस असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. कुचकामी यंत्रणेमुळे वाढली संख्या शहरासह जिल्हाभरात गल्लीबोळात पडलेला कचरा, मांस विक्री दुकानांमधून बाहेर पडणारा कचरा रस्त्याच्या कडेला तसेच ओढ्या-नाल्यांमध्ये टाकला जातो. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. कुचकामी संकलन यंत्रणा व कागदावर राहिलेली नसबंदी मोहीम यामुळे कुत्र्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
लग्न म्हटलं की लाखो रुपयांचा खर्च, भव्य मंडप, डीजेचा दणदणाट आणि पाहुण्यांची मोठी मांदियाळी... पण या सर्व भपकेबाजीला फाटा देत अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील दोन परिवारांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. कोतूळ (ता. अकोले) येथील देशमुख परिवार निफाड (जि. नाशिक) येथे मुलगी पाहायला गेले आणि गोरज मुहूर्तावर लग्न लावूनच नवरीला घरी घेऊन परतले. वेळेची बचत आणि अनावश्यक खर्चाला लगाम घालणाऱ्या या 'आदर्श' निर्णयाचे कौतुक होत आहे. कोतूळ येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश देशमुख यांचा मुलगा अनिकेत (कृषी पदवीधर) याच्यासाठी निफाड येथील दीपक कुंदे यांची मुलगी कल्याणी हिला पाहण्याचा कार्यक्रम ठरला होता. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मुलगी पाहण्याचा विधी झाला आणि दोन्ही बाजूंना स्थळ पसंत पडले. दुपारी १२ वाजता साखरपुड्याचा प्रस्ताव आला आणि दोन्ही बाजूंनी संमती दिली. दुपारी ३ वाजता तातडीने कपडे, दागिने खरेदी करून जवळच्या मंदिरात साखरपुडा पार पडला, सायंकाळी ५ वाजता पुन्हा वऱ्हाड घेऊन येण्यापेक्षा लग्नच लावून दिले तर? हा विचार पतित पावन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व सनदी लेखापाल एस.झेड देशमुख, सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक कैलास देशमुख, शिवाजी देशमुख, दिलीप देशमुख, राजेंद्र कुंदे, सेवानिवृत्त सैनिक वसंत देशमुख, सयाजी देशमुख आदिंसह इतरांनी पुढे आणला. त्यास दोन्ही कडील मंडळी व मुला-मुलीची संमती घेतली, पुन्हा खरेदी झाली आणि सायंकाळी ७ वाजता गोरज मुहूर्तावर मंगलाष्टके पडली. समाजापुढे निर्माण केला एका वेगळा आदर्श वराच्या मिरवणुकीला डीजे, महागडी गाडी भेट, मंडप,व्यासपीठ,विद्यु त रोषणाई, विविध खाद्य पदार्थ असलेले जेवण असे शाही थाटात लग्न लावून समाजात दिखावा तसेच भपकेबाजी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र देशमुख आणि कुंदे परिवाराने दोन नाती जुळवताना या सर्व पंचतारांकित बाबींना फाटा देत साध्या पद्धतीने लग्न लावून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे समाजातून कौतुक होऊन उच्चशिक्षित नव वधू आणि वराचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
परसबाग स्पर्धा:महापालिकेच्या शाळेने फुलवले नंदनवन'; शहरात ओंकारनगर शाळा नंबर वन'
पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आयोजित 'शालेय परसबाग निर्मिती' स्पर्धेत केडगाव येथील महानगरपालिका प्राथमिक शाळा ओंकारनगरने शहरात प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या १० वर्षांच्या सातत्यपूर्ण परिश्रमातून ही शाळा आता खऱ्या अर्थाने 'ग्रीन स्कूल' बनली आहे. शहरातील महापालिका, जिल्हा परिषद आणि खासगी अशा एकूण १३५ शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या सर्वांना मागे टाकत ओंकारनगर शाळेने ११ हजार रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानचिन्ह आपल्या नावे केले. आता या शाळेची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निसर्गाच्या सान्निध्यात शिकवण्याचा प्रयोग मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, शिक्षक शिवराज वाघमारे व वृषाली गावडे यांनी राबवला. ओंकारनगर शाळेत शेवगा, कढीपत्ता, लिंबू, वांगी , मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, पालक, अळू, बटाटा, कोथिंबीर, कांदा, लसूण, दोडका,हळद अशा विविध पालेभाज्यांची लागवड करण्यात आलेली आहे. तसेच सीताफळ, रामफळ, आंबा, चिकू, पेरू,फणस, आवळा, चिंच अशी विविध फळझाडे, विविध औषधी वनस्पती, विविध फुलझाडे यांची लागवड विद्यार्थ्यांच्या मदतीने करण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध रोपांची व झाडांची माहिती प्रत्यक्षपणे मिळाली आहे. शालेय परसबाग निर्मितीसाठी ओंकारनगर शाळेला अहिल्यानगर मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण,शालेय पोषण आहार समन्वयक ज्ञानेश्वर कुटे, केंद्र समन्वयक चंद्रशेखर साठे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, नगरसेवक अमोल येवले, नगरसेवक विजय पठारे, नगरसेविका सुनिता कांबळे, नगरसेविका वर्षा काकडे, प्रशासनाधिकारी जुबेर पठाण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा पल्लवी भुजबळ, उपाध्यक्षा दुर्गा घेवारे यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. शाळेने दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या मदतीने ५५ हजार रुपये खर्च करून स्वत:ची बोअरवेल घोतली आहे. सुवर्णराज ट्रेडर्स, पित्रोडा फर्निचर, सहज फाउंडेशन, रोटरी आणि लायन्स क्लब यांसारख्या संस्थांनी या 'हरित' प्रवासात महत्त्वाची साथ दिली आहे. आनंद मेळाव्यात भाजीपाला विकून विद्यार्थी गिरवतात व्यवसायाचे धडे विद्यार्थ्यांना कोणत्या भाजीतून कोणते पोषक घटक मिळतात याचीही माहिती झाली आहे.तसेच जल व्यवस्थापन,कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प,पाण्याचा पुनर्वापर, टाकाऊ पदार्थांपासून खतनिर्मिती,इको क्लब उपक्रम,पर्यावरणविषयक जागृती इत्यादी उपक्रम शाळेत राबवण्यात येतात.परसबागेतून मिळणाऱ्या भाज्या शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जातात. विद्यार्थी शाळेतील विविध फळांचा आस्वाद घेतात. शाळेतील परसबागेत सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला 'बाल आनंद मेळाव्यात' विकून विद्यार्थी व्यवसायाचे धडेही गिरवत आहेत.
अहिल्यानगर हवामान बदलाचा मोठा फटका अहिल्यानगर जिल्ह्याला बसताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने ३० आणि ३१ मार्च रोजी जिल्ह्यासाठी गारपिटीसह पावसाचा 'ऑरेंज' आणि 'येलो' अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दशकभराचा विचार करता मार्च महिन्यात पाऊस पडण्याचे प्रमाण तब्बल ७० टक्क्यांनी वाढले. दरवर्षी अवकाळी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.रविवारी दिवसभर कडक ऊन असतानाच सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ढग दाटून आले. त्यानंतर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, शहर व परिसरातील तापमान ३७ अंशावर होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमान ३९ अंशावर गेले होते. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे तापमानात घसरण होत आहे. हवामान बदलाचा मोठा परिणाम गेल्या ११ महिन्यात जाणवला आहे. गेल्या वर्षी तीव्र उष्णतेच्या मे महिन्यात जिल्ह्यात १०५ मिमी अतिवृष्टीचा पाऊस झाला होता. सप्टेंबर पासून जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात होते, मात्र सप्टेंबर महिन्यात देखील जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे रब्बीचा हंगाम लांबणीवर पडला होता. त्यातच आता ३०,३१ मार्चला हवामान विभागाने जिल्ह्यात गारपीटीसह पावसाचा ऑरेंज व येलो अलर्ट जारी केला आहे. यापूर्वी १९ ,२० मार्चला जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे ११ हजार हेक्टर क्षेत्राच्या पिकाचे प्राथमिक नुकसान झाले होते. जिल्ह्यात मार्च २०१४ मध्ये ३ दिवस गारपिटीचा पाऊस झाला होता.५० मिमी झालेल्या पावसामुळे १ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. २०१४ पासून सातत्याने मार्चमध्ये पाऊस पडण्याचे प्रमाण ७० टक्क्यांनी वाढत आहे.२०२१ ते २०२६ दरम्यान मार्च महिन्यात पाऊस होत आहे. पूर्वी ५ ते १० वर्षातून एकदा मार्चमध्ये पाऊस व्हायचा. आता मात्र दरवर्षी,दर वर्षाआड मार्चमध्ये अवकाळी पाऊस होत आहे. हे प्रमाण दशक भराच्या तुलनेत ४० टक्क्यांनी अधिक आहे. भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात ३० व ३१ मार्च या कालावधीत तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळे, सोसाट्याचा वारा व गारपीटीची शक्यता व्यक्त केली असून जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच १ व २ एप्रिल या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळे, मध्यम पाऊस व वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. त्याचा परिणाम काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकावर होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये पाऊस कायम राहिल्यास यंदाचा खरीप हंगामावरही त्याचा परिणाम जाणवणार आहे. ^ जिल्ह्यात ३० मार्चला अनेक भागात वादळी वारे,विजांच्या कडकडाटासह जोरदार गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.१ एप्रिलला देखील गारपिटीचा पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गव्हाच्या काढणीला वेग द्यावा. त्याचबरोबर वादळामुळे शेती पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर जनावरांसाठी देखील उपाययोजना कराव्यात. रवी आंधळे, शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी २०२१ ते२६ दरम्यान मार्चमध्ये सातत्याने पाऊस
कन्नड/ नागद ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून आयशर पलटी होऊन १०० फूट दरीत कोसळल्याने ७ जण गंभीर, तर ६ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना गौताळा घाटामध्ये रविवारी (दि. २९) सकाळी घडली. दस्तापूर (ता. सोयगाव) येथील काही मजूर बारामती साखर कारखाना येथे ऊसतोडणीसाठी गेले होते. पट्टा पडल्याने हे मजूर आयशरने (एमएच २१ बीएच ०४४२) गावाकडे येत होते. गौताळा अभयारण्यातील कन्नड- नागद रस्त्यावरील म्हैसघाटात आयशर आला. या वेळी अचानक ब्रेक फेल झाल्याने आयशरची घाटातील संरक्षक भिंतीला धडक बसली. नंतर आयशरने दोन पलट्या खात १०० फूट खोल दरीत पडला. यामुळे आयशरमधील चालकासह १३ जण जखमी झाले. पैकी सात जण गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातानंतर पलट्या खात दरीमध्ये कोसळलेला आयशर दिसत आहे. वंदना अशोक अंभोरे (२५), रुकसाना सलीम तडवी (१७), दिव्या हिरामण पगारे (१७), सोनीबाई सलीम तडवी (३०), रंजनाबाई हिरामण पगारे (३०), मनीषा प्रवीण वाघ (२५), ममता प्रवीण वाघ (१ वर्ष) हे गंभीर जखमी झाले आहेत. कन्नड ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत दाखल केले होते. ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच मी शेजारीली सलीम जमाल तडवी व प्रवीण बापू वाघ यांना उडी मारा असे म्हटले. अनेकांनी बाहेर उड्या मारल्या. तिसऱ्या पलटीत सर्वजण बाहेर फेकले गेले. मी कसाबसा बाहेर पडलो. पोलिस आणि ग्रामस्थांनी आम्हाला दोरखंड व चादरीच्या झोळीच्या साह्याने बाहेर काढले. हे गंभीर जखमी, घाटीमध्ये उपचार सुरू {महेश अंदुरे, चालक हे किरकोळ जखमी महेश अंदुरे (चालक, ३३, रा. खेड, पुणे), अशा सुखदेव पगारे (४५), कोमल हिरालाल पगारे (आठ), ऋतिक प्रवीण वाघ (४), प्रवीण बापू वाघ (३०), सलीम जमाल तडवी (३५, सर्व रा. दस्तापूर, ता. सोयगाव) हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कन्नड ग्रामीण रुग्णालयात डॉ. रुकसाना खान, डॉ. प्रवीण पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध गायकवाड यांनी प्रथमोपचार केले.
घाटनांद्रा हनुमान हे केवळ बलशाली नव्हते. ते विनम्र होते. सेवाभावी होते. बुद्धिमान होते. त्यांच्या चरित्राचे श्रवण केल्याने मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अहंकार नष्ट होतो. आदर्श जीवनाचा मार्ग सापडतो, असे प्रतिपादन धर्मभूषण ज्ञानेश्वर महाराज शेवगावकर यांनी केले. घाटनांद्रा येथे सुरू असलेल्या संगीतमय श्री हनुमान चरित्र कथेच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. श्रीरामनवमीपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. परिसरात भक्तिमय वातावरण आहे. कथेदरम्यान महाराजांनी हनुमान जन्मसोहळा सांगितला. सीतेच्या शोधासाठी समुद्र ओलांडण्याचा प्रसंग मांडला. लंकेतील पराक्रम वर्णन केला. प्रभू श्रीरामांप्रती असलेले समर्पण उलगडले. “आजच्या धावपळीच्या जीवनात हनुमानासारखी निःस्वार्थ सेवा आवश्यक आहे. गुरुभक्ती आवश्यक आहे,” असेही त्यांनी सांगितले. यावेळी गावातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभंगांच्या तालावर फुगड्या खेळल्या जात आहेत. कथेचा आनंद घेतला जात आहे. परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. गावात उत्साहाचे वातावरण आहे. दरवर्षीप्रमाणे ग्रामस्थांच्या सहकार्याने हनुमान जन्मोत्सवानिमित्त सप्ताह आयोजित केला आहे. हा सप्ताह १९ व्या वर्षात आहे. पहाटे काकडा भजन होते. सकाळी ११ ते ३ हनुमान चरित्र कथा होते. सायंकाळी हरिपाठ होतो. रात्री नामांकित कीर्तनकारांचे हरिकीर्तन होते. सप्ताहात आजिनाथ महाराज बलांडे, गोरक्षनाथ महाराज काकडे, अनिल महाराज गुंड, रामेश्वर महाराज कुबेरधाम आदी कीर्तनकारांची सेवा लाभणार आहे. सप्ताहाची सांगता गुरुवार दि. २ रोजी होणार आहे. रामेश्वर महाराज पवार निल्लोडकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. महाप्रसाद होणार आहे. घाटनांद्रा येथे हरिनाम सप्ताहात उपस्थित भाविक आणि ग्रामस्थ.ज्ञानेश्वर महाराज शेवगावकर कथा सांगत आहेत. संगीतमय कथेकरिता तबला, पेटी, हार्मोनियम, गायनासाठी रोहित महाराज उगले, बाबासाहेब गोरे, विजय महाराज लोंढे, भागवत महाराज कचरे, आसाराम महाराज मुंढे, बाळा बावस्कर, उद्धव महाराज जामकर, प्रकाश महाराज नागरे, काशिनाथ महाराज तायडे, अनिल जैस्वाल, नारायण पवार यांचे सहकार्य मिळत आहे.
तालुक्यातील देवगाव रंगारी येथील संत बहिणाबाई जन्मस्थळ व वासडी येथील त्रिकुटेश्वर देवस्थानच्या विकासासाठी मंजूर झालेल्या ४.५० कोटी निधीवरून विद्यमान आमदार संजना जाधव व भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे यांच्यात श्रेय घेण्यावरून सोशल मीडियावर युध्द सुरू झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य डॉ. गव्हाणे व आमदार जाधव यांनी आपणच निधी मंजूर करून आणल्याचा दावा ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला. देवगाव रंगारी गटाचे भाजप जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे यांनी सांगितले की, ‘‘अनेक दिवसांपासून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे देवगाव रंगारी येथील संत बहिणाबाई जन्मस्थळ व वासडी येथील त्रिकुटेश्वर देवस्थानच्या विकासासाठी निधी देण्यात यावा, यासाठी पाठपुरावा करत होतो. येथील स्थळांना पर्यटन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ब-वर्ग अंतर्गत दर्जा मिळावा म्हणून पाठपुरावा करत होतो. देवगाव रंगारी व वासडी येथील देवस्थानचे विश्वस्त, पुजारी व ग्रामस्थ साक्षीदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री अतुल सावे, जिल्हा अध्यक्ष संजय खंबायते यांनीही सहकार्य केले.’’ मी मागणी केल्यामुळे निधी मंजूर झाला ः आमदार संजना जाधव आमदार संजना जाधव म्हणाल्या की, ग्राम विकास मंत्री श्री. गोरे यांनी मला फोन करून तुमच्या तालुक्यात कोणत्या धार्मिक स्थळांना ब दर्जा द्यायचा आहे व विकास निधी मंजूर करायचा आहे, याची विचारणा केली. मी तत्काळ त्यांना व्हॉट्सअॅपवरून देवगाव रंगारी आणि वासडी येथील त्रिकुटेश्वर मंदिरास निधी द्यावा, अशी मागणी केली. त्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यात कोणत्या जिल्हा परिषद सदस्यांना कोटीचा निधी मंजूर झाला ते दाखवून द्यावे. देवस्थानाच्या विकासकामांसाठी ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल मी सोशल मीडियावर महायुती सरकारचे आभार मानले आहेत.
गंगापुरात नऊ दिवसांच्या उपवासाची सांगता:55 कुटुंबांतील 57 नागरिक होते सहभागी
‘जास्त खाल्ले म्हणजे जास्त ऊर्जा’ हा समज गंगापुरात खोडून निघाला. निसर्गशक्तीच्या जोरावर शरीर केवळ लिंबू, मध, पाणी यावरही नऊ दिवस ठणठणीत राहू शकते, याचा अनुभव नागरिकांनी घेतला. छत्रपती संभाजीनगर येथील मानस योग साधना केंद्राअंतर्गत तप-सेवा-सुमिरण समितीने ‘भोजन से शक्ती नहीं’ या वैश्विक सिद्धांतावर आधारित विशेष उपवास आयोजित केला होता. गुरुवारी (दि. २६) या उपवासाची उत्साहात सांगता झाली. ‘मानस योग साधना’ प्रणीत नवरात्र उपवास कठोर मानला जातो. १९ मार्चपासून सुरू झालेल्या साधना सप्ताहात गंगापुरातील ५५ कुटुंबांतील लहानांपासून वृद्धांपर्यंत ५७ नागरिक सहभागी झाले. अन्नत्याग केला. नैसर्गिक घटकांवर राहिले. शरीरातील चैतन्य टिकवण्याचा अनुभव घेतला. या काळात शारीरिक शुद्धीचा अनुभव आला. मानसिक बदल जाणवला. आध्यात्मिक स्थित्यंतरही झाल्याची प्रतिक्रिया उपासकांनी दिली. ‘हा सप्ताह आमच्या आयुष्यात सामाजिक जाणिवांची भर घालून गेला,’ अशा भावना व्यक्त झाल्या. निसर्गोपचारातून आरोग्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाल्याचेही सहभागी म्हणाले. वाढते आजार, बिघडलेली जीवनशैली यावर नियंत्रणासाठी प्रत्येकाने वर्षातून किमान दोनदा, नवमी व नवरात्रीत, असा उपवास करावा. आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन तप-सेवा-सुमिरण समितीने केले. या उपक्रमामुळे परिसरात आरोग्याबाबत नवी जनजागृती निर्माण झाल्याचेही सांगण्यात आले.
तालुक्यातील ममनापूर परिसरातील अनेक वर्षांपासून रखडलेला पाणंद रस्ता अखेर मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे. या कामाला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे ५ किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. खुलताबादचे तहसीलदार संतोष गुट्टे यांनी स्थळ पाहणी केली. रस्ता लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश दिले. त्यामुळे प्रलंबित प्रश्नाला गती मिळाली. स्थानिक शेतकरी, समाजसेवक पांडुरंग जाधव यांनी सांगितले की, पिढ्यान्पिढ्या रस्त्याअभावी त्रास सहन करावा लागला. शेतीमाल वाहतूक अडचणीची होती. दळणवळण खोळंबत होते. आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या अडचणी येत होत्या. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर समस्येची दखल घेतली गेली. आता आमचा वनवास संपणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या कामासाठी स्थानिक आमदारांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम झाले, असे जाधव यांनी सांगितले. उर्वरित कामेही लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागण्या मांडल्या. जिथे रस्ता धोकादायक, अवघड आहे तिथल्या कामाला प्राधान्य द्यावे. काही ठिकाणचे अतिक्रमण हटवावे. कठोर कारवाई करून रस्ता मोकळा करावा. शासन नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त झाली.
पंचायत समितीच्या चार वर्षांनंतर झालेल्या मासिक बैठकीत सदस्या वृषाली सुनील मिरकर यांनी विविध प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. सिंचन विहिरी, घरकुल, पाणीटंचाई या मुद्द्यांवर त्यांनी विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. शुक्रवारी झालेल्या बैठकीत मिरकर यांनी सन २०२४-२५ मध्ये आर्थिक व्यवहारातून सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या, असा आरोप केला. मंजूर विहिरी पुन्हा रद्द झाल्याने लाभार्थ्यांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. आता विहिरी मंजूर करताना रद्द करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. रोजगार हमी योजनेतील विविध कामांची देयके थकली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. घरकुल कामांची देयकेही थकली आहेत. ती तत्काळ द्यावीत, अशी मागणी केली. विहिरींच्या मस्टरमधील अडचणी दूर कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. मराठवाडा वॉटर ग्रीड पेयजल योजनेअंतर्गत ज्या गावांत कामे पूर्ण झाली आहेत, त्या गावांत पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी जास्तीचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना रोजगार हमी योजनेतून विहिरी मंजूर करून पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी केली. मागणी येताच टंचाईग्रस्त गावांसाठी विहीर अधिग्रहण करावे. टँकर उपलब्ध करून द्यावेत, असेही त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या दालनात अधिकाऱ्यांच्या कामांचे नियुक्ती फलक लावावेत, अशी मागणीही त्यांनी मांडली. जप्त साठ्यातील वाळू द्या घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळूचे शासन धोरण आहे. मात्र लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्याने तीन-चार हजार रुपये ब्रासप्रमाणे वाळू विकत घ्यावी लागत असल्याचे मिरकर यांनी सांगितले. त्यामुळे घरकुलधारकांना अधिकचे पैसे द्यावे लागत आहेत. तालुक्यातील अवैध जप्त वाळूसाठ्यातील वाळू तहसील प्रशासनाकडून घरकुलधारकांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
मराठवाडा प्रदेशाच्या जैवविविधतेला अधोरेखित करणारी एक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक नोंद समोर आली आहे. तालुक्यातील लाडगाव परिसरातील नैसर्गिक अधिवासात अत्यंत दुर्मिळ ‘फायलोथेलिस वेस्टवुडाई’ (युनिकॉर्न मँटिस) या प्रजातीचे प्रथमच अधिकृत दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, या शोधामुळे परिसरातील पर्यावरण संतुलित व समृद्ध असल्याचे स्पष्ट होत असून जैवविविधतेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मराठवाड्यात मँटोडिया गणातील प्रजातींच्या विविधतेवर सुरू असलेल्या अभ्यासादरम्यान ही महत्त्वपूर्ण नोंद समोर आली आहे. लाडगाव परिसरातील नैसर्गिक अधिवासात आढळलेल्या या दुर्मिळ ‘फायलोथेलिस वेस्टवुडाई’ (युनिकॉर्न मँटिस) प्रजातीमुळे संशोधकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रजातीचे अस्तित्व हे पर्यावरणातील संतुलन आणि परिसंस्थेची निरोगी स्थिती दर्शवणारे मानले जाते. या संशोधन कार्याला शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखली (जि. बुलढाणा) येथील प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एम. टी. निकम यांचे मार्गदर्शन लाभले. संशोधन प्रक्रियेत विद्यार्थिनी हिना खान यांचा सक्रिय सहभाग असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील संशोधक प्रशांत सोमवंशी यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा दुर्मिळ प्रजातींची नोंद केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातूनच नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची ठरते. या शोधामुळे मराठवाड्यातील जैवविविधतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून भविष्यातील संशोधनासाठीही नवे दालन खुले झाले आहे. अभिमानाची बाब या शोधामुळे मराठवाड्याची नोंद आता युनिकॉर्न मँटिसच्या जागतिक वितरण नकाशावर झाली ही अभिमानाची बाब आहे. पुढील काळात या प्रजातीचा प्रसार, वर्तन आणि संवर्धन यावर सखोल संशोधनाची गरज अधोरेखित झाली आहे. वैजापुरातील ही नोंद महाराष्ट्रातील जैवविविधता अभ्यासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे प्रा. डॉ. एम. टी. निकम (प्राणिशास्त्र विभाग, शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखली) यांनी सांगितले. आशियातून लाडगावपर्यंत दुर्मिळ नोंद ः युनिकॉर्न मँटिस ही प्रजाती प्रामुख्याने आशियातील उष्णकटिबंधीय भागात आढळत असून चीन व श्रीलंकेत तिची नोंद झाली आहे. तालुक्यातील लाडगाव येथे तिचा शोध लागणे ही मराठवाड्यासाठी पहिली अधिकृत वैज्ञानिक नोंद ठरली आहे. ‘युनिकॉर्न'ची अनोखी रचना फायलोथेलिस वेस्टवुडाई ही आशियाई मूळ असलेली दुर्मिळ मँटिस प्रजाती असून डोक्यावरच्या शिंगासारख्या रचनेमुळे तिला ‘युनिकॉर्न मँटिस' म्हटले जाते.
छत्रपती संभाजीनगर-मुंबई महामार्गाचे सौंदर्य असलेला खवड्या डोंगर आता भूमाफियांच्या विळख्यात सापडला आहे. निसर्गाचे लेणे असलेला हा डोंगर पोखरून मुरूम, माती, दगडांची राजरोस लूट सुरू आहे. विशेष म्हणजे ही लूट प्रशासनास दिसत असतानाही केवळ अर्थपूर्ण तडजोडींमुळे वरिष्ठ अधिकारी डोळे झाकून बसल्याचा गंभीर आरोप होत आहे. दिवसाढवळ्या, रात्रीच्या काळोखात पोकलेन, जेसीबी, हायवा ट्रक्सचा ताफा या डोंगराचे अस्तित्व संपवत आहे. बेकायदेशीर उत्खननामुळे येथे खोल खड्डे तयार झाले आहेत. त्यात साचलेल्या पाण्यात पडून एका व्यक्तीचा अंत झाला आहे. खवड्या डोंगर आता आत्महत्येचा ‘हॉटस्पॉट’ बनत चालला आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जमिनी हडपण्यासाठी भूमाफियांकडून जाणीवपूर्वक हा डोंगर भुईसपाट केला जात आहे. पावसाळ्यात येथे मोठी दरड कोसळण्याची भीती आहे. प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. प्रशासकीय आशीर्वादानेच चोरी एकीकडे वृक्षारोपणाच्या गप्पा मारणारे प्रशासन दुसरीकडे डोंगराची चोरी उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. वेळीच कारवाई झाली नाही तर हा डोंगर केवळ नकाशावर उरेल. प्रशासकीय आशीर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाची चोरी होणे अशक्य आहे. अर्थपूर्ण तडजोडींचा डोंगर खवड्या डोंगराच्या उत्खननाची माहिती स्थानिक पोलिस, महसूल विभागाला नाही, असे म्हणणे हास्यास्पद आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रत्येक हायवा, जेसीबीच्या फेऱ्यांमागे ठरावीक हप्ता पोहोचवला जातो म्हणूनच वारंवार निवेदने देऊनही ‘भरारी पथक’ या रस्त्याकडे फिरकत नाही. ही ‘अर्थपूर्ण’ शांतता आता डोंगराच्या अस्तित्वावर उठली आहे. ..तर अधिकाऱ्यांविरोधातही कारवाई करू अवैध गौण खनिज चोरी होत असेल तर चोरांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. कोणी अधिकारी अशा चोरांना अभय देत असेल तर त्या अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही. भरारी पथकामार्फत आम्ही या चोरांना, त्यांना मदत करणाऱ्यांना आळा घालू. -दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी.
आखाती देशांतील युद्धाचा परिणाम आता सोलापूरच्या बाजारपेठेवर जाणवत आहे. खाद्यतेलाच्या आयात आणि पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या १५ दिवसांत सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाच्या दरात लिटरमागे सरासरी २० रुपयांची वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे वाढलेले भाव आणि जहाजांचा वाढलेला वाहतूक खर्च यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. शहराला दररोज सुमारे २५ हजार लिटर खाद्यतेलाची गरज भासते. मात्र, सध्या युद्धामुळे आयात मंदावल्याने १७ ते १८ हजार लिटरचाच पुरवठा सुरु असल्याचे सोलापूर जिल्हा खाद्य तेल असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, एकिकडे इतर तेलांचे दर वाढत असले तरी करईच्या दरात प्रती किलोमागे १०० रुपयांची घसरण झाली आहे. ७ हजार लिटरने पुरवठा कमी नेहमी उन्हाळ्यात लग्नसराईमुळे तेलाचे भाव वाढतात, असा समज असतो. मात्र, यंदाचे कारण वेगळे आहे. समुद्र मार्गावरील जहाजांवर होणारे हल्ले आणि वाढलेला विमा खर्च यामुळे कच्च्या तेलाची आयात महागली आहे. सोलापूरला होणारा पुरवठा मागील १५ दिवसांत ७ हजार लिटरने कमी झाला आहे. पुरवठा विस्कळीत झाल्याने दरवाढ होत आहे. पुरवठा कमी झाल्यानेच दरात मोठी वाढ झाली. मध्य-पूर्वेतील स्थिती नियंत्रणात आली नाही तर तेलाचे दर आणखी वाढू शकतात, असे तेल व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांवर होईल. मासिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. साठेबाजी रोखण्यासाठी प्रयत्न झाले तर दर स्थिर राहतील येत्या १५ दिवसांत युद्धविराम न झाल्यास सोयाबीन आणि शेंगदाणा तेलाच्या दरात आणखी ५ ते ८ टक्क्यांची वाढ होऊ शकते. स्थानिक तेल गिरण्यांवर अवलंबून रहावे लागण्याची शक्यता आहे. काही व्यापारी दर वाढीसाठी जाणीवपूर्वक साठेबाजी करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रशासनाने साठेबाजी रोखण्यासाठी आतापासून प्रयत्न करायला हवेत. दर आणखी वाढण्याची भीती आखाती युध्दामुळे जहाजांना आता लांबचा वळसा घालून यावे लागत असल्याने प्रती बॅरल वाहतुकीचा खर्च वाढला. ज्याचा बोजा थेट ग्राहकांवर पडत आहे. खाद्यतेलाच्या किमतीत २० रुपयांची वाढ आहे. जर युद्ध लांबले, तर पामतेलाची आयात (जी प्रामुख्याने इंडोनेशिया-मलेशियातून होते) देखील महाग होऊ शकते. कारण इंधनाचे दर वाढल्याने देशांतर्गत वाहतूकही खर्चिक होण्याची शक्यता आहे. दर आणखी वाढण्याची भीती आहे. यावर सध्या तरी कोणताही उपाय नाही. दरवाढ रोखण्याचे उपाय शासनच करू शकेल. अभिजित परदेशी, सचिव, खाद्यतेल असोशिएशन. सोलापूर सध्याचे आणि पूर्वीचे तेलाचे दर (प्रति लिटर)खाद्यतेल १५ दिवसांपूर्वी आताचे दरसूर्यफूल १६० ते १६४ १९२ ते १९६सोयाबीन १४१ ते १४५ १६६ ते १७२पामतेल १४० ते १४५ १६० ते १६५सरकी रिफाईंड १६४ ते १७० १४५ ते १५०शेंगदाणे १७८ ते १८४ १६० ते १६५करडी ४२० ३२०
शहरात गेल्या काही दिवसांपासून उद्भवलेल्या इंधन आणि गॅस टंचाईने आता भीषण रूप धारण केले आहे. युद्धाच्या झळा आणि विस्कळीत पुरवठ्याचे थेट परिणाम आता सामान्यांच्या ताटावर आणि खिशावर दिसू लागले आहेत. सीएनजी आणि एलपीजीअभावी रिक्षाचालकांनी प्रवासी भाड्यात थेट १० ते २० रुपयांची वाढ केली आहे, तर कमर्शियल गॅस सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांनी चक्क लाकूड-कोळशाचा आधार घेत खाद्यपदार्थांचे दर वाढवले आहेत. यामुळे सर्वसामान्यांचा वडापाव आणि समोसा आता आवाक्याबाहेर गेला आहे. गॅस टंचाईमुळे हवालदिल झालेल्या रिक्षाचालकांचा संयम रविवारी (२९ मार्च) सकाळी सुटला. अनेक रिक्षाचालकांनी थेट पालकमंत्री संजय शिरसाट यांचे घर गाठले. ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा, रात्र-रात्र जागूनही गॅस मिळत नसल्याची व्यथा मांडताना अनेक रिक्षाचालकांना रडू कोसळले. रात्रभर रांगेत लागून ५०० रुपयांचा गॅस मिळतो, दिवसभर तिथेच गेल्यास घर कसे चालवायचे? आम्ही जगायचे कसे? असा आर्त सवाल त्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडला. एका महिनियासाठी दरवाढीचे मेन्यू कार्ड खाद्यपदार्थ जुना दर नवा दर दरवाढ?वडापाव १५ रु २० रु ५ रुसमोसा १५ रु २० रु ५ रु.नाष्टा(पोहे/उपमा २० ते २५ रु ३०-३५ रु ५ ते १० रु. अशी आहे शहराची स्थितीशहरातील एकूण रिक्षा: २५,०००केवळ पेट्रोलवर चालणाऱ्या: १०,५२६एलपीजी आणि पेट्रोल (दोन्ही): ९,५००फक्त एलपीजीवर चालणाऱ्या: ३,८८१सीएनजीवर चालणाऱ्या: १,०९६ शेअर रिक्षास स्पेशल रिक्षाचे दर वाढलेरिक्षा पूर्वी दर दर वाढशेअर रिक्षा (टप्पा) २० रु.३० रु १० रुस्पेशल रिक्षा १२० रु. १५०दरामध्ये अंतरानुसार वाढ करण्यात आली.कॅनॉटमधील फूड स्टॉल चालक अभिजित म्हस्के यांनी तर स्टॉलवर ‘गॅस दरवाढीमुळे भाववाढ’ अशी पाटीच लावली आहे. लाकडाचा आधार घेऊन ते स्टॉल चालवत आहेत. ‘नियंत्रण नसेल तर एनओसी रद्द करा’ रिक्षाचालकांचे अश्रू पाहिल्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तत्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांना फोन लावला आणि प्रशासकीय अनास्थेचे वाभाडे निघाले. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, “शहरातील रिक्षाचालकांचे इतके हाल का होत आहेत? या प्रश्नावर जिल्हा पुरवठा अधिकारी फुलारी म्हणाले की, ऑटो एलपीजीवर आमचे नियंत्रण नाही. नागपूरचे अधिकारी आमचा फोन उचलत नाहीत, तर शिरसाट संतापाने म्हणाले “जर नियंत्रण नसेल तर ते तुमची एनओसी घेऊनच पंप चालवतात ना? मग्रुरीने पंप चालवत असतील तर थेट त्यांची एनओसी रद्द करा! रिक्षाचालकांना ६ तास वेटिंग रिक्षाचालक राजेंद्र आरसूड यांनी सांगितले की, ४ ते ६ तास रांगेत उभे राहावे लागते. या त्रासामुळे रिक्षाचालकांनी स्वेच्छेने भाडेवाढ केली आहे. सिडको बसस्टँड ते मध्यवर्ती स्थानक या प्रवासाचे भाडे १२० रुपयांवरून थेट १५० रुपये झाले आहे. इडली-डोसा मेन्यूमधून गायब हॉटेल शिवाचे अशोक निकम म्हणाले की, गॅस नसल्याने इडली, डोसा हे नाष्ट्याचे पदार्थ देणे बंद केले आहे. दररोज १-२ सिलिंडर लागतात, आता नाईलाजाने कोळसा वापरावा लागत असल्याने ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होत आहे. प्रवाशांची ओरड, प्रशासन सुस्त अचानक झालेल्या या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र, गॅसचा पुरवठा सुरळीत कधी होणार, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. आगामी २ दिवस पुरवठा नाहीच! जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी शहरातील चारही एलपीजी पंपांची पाहणी केली. आज चारही पंपांवरील गॅस संपला असून, व्यवस्थापकांच्या माहितीनुसार आगामी २ दिवस हा पुरवठा होणार नाही. तर अंबादास दानवे यांच्या कार्यालयात रिक्षाचालकांची बैठक पार पडली. दोन दिवसांत समस्या न सुटल्यास चक्काजामचा इशारा दानवे यांनी दिला आहे. गॅस उपलब्ध असेपर्यंत पंप २४ तास सुरू ठेवावेत, गॅस भरल्याची अधिकृत पावती द्यावी अशी मागणी यावेळी केली.
खडकाळ जमीन, पाण्याच्या तीव्र टंचाईवर मात करून खडकनार (ता.गंगापूर) येथील शेतकरी पुंडलिक पवार यांनी परवल भाजीच्या शेतीतून आर्थिक स्वावलंबन मिळवले. बाजारपेठेचा अचूक अभ्यास करून त्यांनी टँकरने पाणी आणत प्रयोग यशस्वी केला. अवघ्या दीड एकर क्षेत्रातून त्यांनी वर्षभरात पाच लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये लोकप्रिय असलेली परवल ही फळभाजी पीक स्थानिक बाजारपेठेत आणण्याचा त्यांनी धाडसी निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगरातील वाळूज एमआयडीसी परिसरात परप्रांतीय कामगारांमुळे या भाजीला कायमस्वरूपी मागणी असल्याचे त्यांनी ओळखले. त्यामुळे आपल्या शेतीत ही भाजी पिकवून स्थानिक स्तरावरच तिची विक्री केली. बाजारपेठेचा अचूक अभ्यास करत योग्य नियोजनाने हा प्रयोग यशस्वी केला. परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देऊन मार्गदर्शन घेत आहेत. भाजीपाल्याची लागवड करताना कोणत्या पिकाला जास्त दर, सतत मागणी आहे, हे पाहून त्यांनी परवल व करटुले लागवडीचा निर्णय घेतला. दरम्यान, परवल या भाजीला किमान 50 ते कमाल 60 रुपये प्रतिकिलो दर मिळतो. गुजरात राज्यातून आणली बियाणे सुरुवातीला त्यांनी फक्त दहा गुंठ्यांत प्रयोग म्हणून परवल या भाजीची लागवड केली. गुजरातवरून 250 ग्रॅम बियाणे 10 हजार रुपयांना विकत घेऊन त्यांनी जोखीम घेतली. मात्र, कमी कालावधीत चांगले उत्पादन व उत्तम दर मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी भाजी लागवडीचे क्षेत्र वाढवले. विशेष म्हणजे परवलच्या शेतीसाठी पहिल्या वर्षीच 50 हजारांपर्यंत खर्च येतो. पुढील दोन ते तीन वर्षे काढणीव्यतिरिक्त खर्च लागत नाही. 67 गुंठ्यांत सात पिके शेतकरी पवार यांनी 67 गुंठे क्षेत्रात सात प्रकारची पिके घेतली आहेत. त्याल वाल, भेंडी, टोमॅटो, करटुले आणि परवल अशी पिके प्रत्येकी पाच ते दहा गुंठ्यांत त्यांनी लावली आहेत. सर्व पिके सेंद्रिय व जैविक पद्धतीने घेतली जात असल्याने उत्पादनाला बाजारात विशेष मागणी आहे. तसेच खर्चातही बचत झाली आहे. आपणही शेतकरी आहात. अनोख्या प्रयोगांची संपूर्ण माहिती, छायाचित्र-व्हिडिओ आपल्या नाव व पत्त्यासह 8888840081 या व्हॉट्सॲपवर पाठवावी. मात्र ही माहिती यापूर्वी वृत्तपत्रात, सोशल मीडियावरही प्रसिद्ध झालेली नसावी.
शहरातील बागशेरजंग परिसरातील तब्बल ५०० ते ५५० कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या ९ एकर जमिनीचा घोटाळा समोर आला आहे. तब्बल आठ वर्षे स्वतःचे लाखो रुपये खर्च करून महसुली लढाई जिंकून देणाऱ्या वकिलालाच मूळ मालकाने दगा दिला. वकिलाच्या परस्पर या कोट्यवधींच्या जमिनीचा हिबानामा (बक्षीसपत्र) खासदार संदिपान भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख याच्यावर या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहता पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. परभणी येथील वकील ॲड. मुजाहीद इकबालखान समीउल्ला खान (५२) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. २०१५ मध्ये त्यांच्याकडे जमिनीचा जुना खटला घेऊन आले होते. पी.आर. कार्डवर नाव लागल्यानंतर ९ एकरांपैकी ३ एकर जमीन देण्याचे या दोघांत ठरले होते. त्यानुसार ॲड. मुजाहिद यांनी स्वतःचे सुमारे ९० लाख ते १ कोटी रुपये खर्च करत ८ वर्षे खटला चालवला. या सर्व प्रक्रियेदरम्यान मीर महेमूद अली यांनी वकिलाला अॅग्रीमेंट टू सेल, ओरल हिबा आणि इरोव्होकेबल जनरल पॉवर ऑफ अटर्नी कायदेशीररीत्या लिहून दिली होती. मात्र, खटला जिंकून जमिनीवर नाव लागताच मीर अलीने हुसेननगर येथे राहणारा ड्रायव्हर जावेद रसूल शेख (३८) याच्या नावे दुसरा नोटराइज्ड हिबानामा तयार केला आणि जमिनीचा ताबाही त्याला दिला. जेव्हा वकिलाने २०२३ मध्ये प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन विचारणा केली, तेव्हा जावेद शेख याने ‘तुझी कबर येथेच खोदू’ अशी जिवे मारण्याची धमकी दिली. इरोव्होकेबल जीपीए जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याला मालमत्तेचे सर्व अधिकार देते आणि ते अधिकार सहजासहजी रद्द करता येत नाहीत, त्याला इरोव्होकेबल जनरल पॉवर ऑफ अटर्नी म्हणतात. फिर्यादी वकिलाकडे असे नोंदणीकृत अधिकार असूनही परस्पर व्यवहार झाल्याने हा विश्वासघाताचा गुन्हा ठरतो. काय असतो हिबानामा? मुस्लिम कायद्यानुसार, हिबा म्हणजे आपली मालमत्ता कोणत्याही मोबदल्याशिवाय दुसऱ्याला स्वेच्छेने बक्षीस देणे. या प्रकरणात मूळ मालकाने आधी वकिलाला आणि नंतर पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला (चालकाला) हिबानामा करून दिल्याने हा कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. २०१५ ते २०२३ पर्यंतचा घटनाक्रम असा शासकीय किंमत २४१कोटी, बाजारभाव ५५० कोटी फिर्यादीनुसार, या जमिनीची शासकीय किंमत (रेडीरेकनर) २४१ कोटी ८९ लाख रुपये आहे, तर प्रत्यक्ष बाजारभाव ५५० कोटींहून अधिक आहे. मुजाहिद यांनी या जमिनीसाठी आतापर्यंत खान याला ९० लाख ते १ कोटी रुपये दिले होते. दरम्यान हे प्रकरण मागील काही वर्षांपासून मराठवाड्यासह संभाजीनगर शहरात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान या राजकीय नेत्यांचे या प्रकरणाकडे विशेष लक्ष आहे.
तालुक्यातील पांगरी येथे हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली. एका विवाहित महिलेने आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्या मुलाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली, तर सहा वर्षाच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर संबंधित महिलेने घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. २८) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी कल्याण किसन जाधव (६६, रा. पांगरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते शेती व्यवसाय करतात. त्यांचा मोठा मुलगा नीलेश जाधव हा धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कल्याण जाधव व त्यांची पत्नी सुचिता हे ममदापूर येथील शेतात गेले होते. त्या वेळी घरी त्यांची सून आशा जाधव (२८) ही तिची सहा वर्षांची मुलगी अद्विका आणि सहा महिन्यांच्या मुलासह होती. दरम्यान, जाधव हे घरी परतल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील खोलीत पाहणी केली असता सहा महिन्यांचा नातू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. धारदार ब्लेड व कटरने त्याच्या गळ्यावर वार करण्यात आले होते. घटनास्थळी रक्ताने माखलेले ब्लेड व कटर पोलिसांनी जप्त केले आहेत. दुपारी साडेतीनच्या सुमारास शेजारी अल्लामिन शेख यांनी जाधव यांना फोन करून माहिती दिली की, तुमची सून आशा हिने घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी मारली. जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल जाधव दांपत्याने पांगरी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. तिथे त्यांची नात अद्विका गंभीर जखमी अवस्थेत आढळली. तिच्या गळ्यावर व हातावर खोल जखमा होत्या. प्राथमिक उपचारानंतर आशा व अद्विका यांना पुढील उपचारासाठी बार्शी आणि नंतर सोलापूर येथे हलवण्यात आले.याप्रकरणी आशा जाधव हिच्याविरुद्ध स्वतःच्या मुलाची हत्या व मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.
धार्मिक श्रद्धेचा बाजार मांडून महिलांचे लैंगिक शोषण करणारा आणि कोट्यवधींची माया जमवणारा नराधम अशोक खरात महिलांना गुंगीकारक पेढा आणि कडवट पाणी देऊन संमोहित करायचा आणि नंतर अत्याचार करायचा, असा खळबळजनक आरोप रविवारी (दि. २९) नाशिक जिल्हा न्यायालयात सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. खरातच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला हजर केले असता, अतिरिक्त मुख्य सत्र न्यायाधीश श्रीमती बराडे यांनी त्याला १ एप्रिलपर्यंत पुन्हा पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एसआयटीने राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह ईशानेश्वर मंदिर ट्रस्टच्या ११ विश्वस्तांना (ट्रस्टी) चौकशीसाठी समन्स बजावले आहे. यासोबतच ट्रस्टच्या नावाखाली चालणाऱ्या बेकायदा आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी तसेच ट्रस्टच्या निर्णय प्रक्रियेत विश्वस्तांची भूमिका आणि आर्थिक फसवणुकीतील त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी एसआयटीने हा समन्स बजावला आहे. खरातची कोठडी तपासकार्यासाठी आवश्यक असल्याची बाब न्यायालयाला पटवून देण्यात सरकारी वकिलांना यश आले. त्याविरोधात खरातच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद न्यायालयासमोर निष्प्रभ ठरला. त्यामुळे न्यायालयाने खरातच्या ३ दिवसांची कोठडी देण्याला मंजुरी दिली. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ एम. वाय. काळे यांनी पीडितेची बाजू मांडताना सांगितले की, खरातने केवळ शारीरिक शोषण केले नाही, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. दैवी शक्तीचा खोटा दावा करून आणि रसायने पाजून महिलांच्या बुद्धीचा ताबा घेणाऱ्या या समाजविघातक माणसाला कोठडी मिळालीच पाहिजे. यासोबतच या प्रकरणी हाती लागलेल्या माहितीचा आणखी खोल तपास करण्यासाठीही तपास संस्थेने अधिक कालावधी आवश्यक असल्याचे न्यायालयात सांगितले. उल्लेखनीय बाब म्हणजे, १८ मार्च रोजी अटक केलेल्या खरातला न्यायालयाने पहिल्यांदा ७ दिवसांची, नंतर ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. ती रविवारी संपुष्टात येत असल्याने न्यायालाने त्याला पुन्हा ३ दिवसांची कोठडी सुनावणी आहे. मोबाईल, संगणकातील डाटा रिकव्हरीने ठरणार तपासाची दिशा : खरातने हवालामार्फत १०० कोटी दुबईला धाडल्याचा संशय खरातने या ट्रस्टच्या माध्यमातून १०० कोटी रुपये हवालाद्वारे दुबईला पाठवल्याचे उघड झाले असून, एकूण ३०० कोटींचा व्यवहार एका सीएच्या मदतीने केल्याचा संशय आहे. यादरम्यान, अटकेच्या भीतीने संबंधित सीए खरातविरुद्ध साक्ष देण्याची शक्यता आहे. त्याच्या चौैकशीतूनही ट्रस्टचे आर्थिक गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता दाटली आहे. मोबाइल डाटा विश्लेषण, भोंदूगिरी रॅकेटच्या उलगड्यासाठी खरातची कोठडी वाढवली सरकारी वकील : खरात पेढा व गुंगीकारक पाणी देऊन महिलांना संमोहित करून अत्याचार करायचा. त्या पदार्थांचा स्रोत शोधणे बाकी. आरोपीचे वकील : परवानाधारक शस्त्रावरून ‘नरबळी’चा खोटा संशय व्यक्त करून पोलीस दिशाभूल करत आहेत. खरातच्या पोलिस कोठडीत ३ दिवसांची वाढ यापूर्वी कोर्टाने दिलेली ५ दिवसांची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्यामुळे रविवारी खरातला सत्र न्यायालयात हजर केले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने रविवारीही विशेष सुनावणी घेतली. खरातचे तोंड झाकून कोर्टात आणले गेले. गतवेळी खरातच्या अंगावर गर्दीने धावून जाण्याची घटना लक्षात घेता यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.
संभाजीनगरात रुग्णालयाला भीषण आग:रुग्ण बचावले, बघ्यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळा
शहरातील गजानन महाराज मंदिर चौकात असलेल्या ‘गजानन हॉस्पिटल’ला रविवारी रात्री भीषण आग लागली. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व रुग्णांना वेळेत सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. मात्र, या आगीत रुग्णालयाचा तिसरा मजला संपूर्णपणे जळून खाक झाला आहे. रविवारी रात्री पावणेआठच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावर धुराचे लोट दिसू लागले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले व ज्वाळा ऑक्सिजन लाईनपर्यंत पोहोचल्यामुळे मोठी घबराट निर्माण झाली होती. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अंतर्गत अग्निशमन यंत्रणा वापरत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रुग्णांना रुग्णवाहिकांच्या साहाय्याने तातडीने जवळच्या इतर खासगी रुग्णालयांत उपचारासाठी हलवण्यात आले. रात्री ९ पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. घटनाक्रमातील प्रमुख टप्पे रात्री ७:५० ते ८:०० : तिसऱ्या मजल्यावरून धुराचे लोट; आग ऑक्सिजन लाइनपर्यंत पोहोचल्याने मोठी खळबळ.रात्री ८:१० : अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू.रात्री ८:१५ : सर्व रुग्णांना रुग्णवाहिकेने सुरक्षितरीत्या जवळच्या रुग्णालयांत हलवण्यास सुरुवात.रात्री ९:०० : आगीवर पूर्ण नियंत्रण; ‘कूलिंग’ प्रक्रिया आणि नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू.गजानन हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. (वर्तुळात) पेशंट हलवण्याचे काम सुरू आहे. एका बाजूने रस्ता बंद केला.
आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशात एलपीजी गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. तीन महिन्यांनंतर कदाचित एलपीजी गॅसचा पुरवठा बंद होऊ शकतो असे भुजबळ म्हणाले. शनिवारी दिल्ली येथे आयोजित केंद्र सरकारच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी भुजबळ यांनी […] The post पीएनजी जोडण्यांवर भर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आशाताई ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनरेखा
चाकूर : प्रतिनिधी आशाताई या ग्रामीण भागातील लोंकाचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी अहोरात्र मेहनत घेतात तसेच आरोग्याशी निगडित प्रत्येक योजना ही जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करतात म्हणून आशा या ग्रामीण भागातील लोकांच्या जिवनरेखा बनल्या असून त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जि.प.चे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे यांनी केले. चाकूर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अंतर्गत येथील यशवंत मंगल कार्यालयात […] The post आशाताई ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनरेखा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नांदेड-जळकोट- बिदर बस सुरू करणार
जळकोट : प्रतिनिधी नांदेड ते बिदर हा राष्ट्रीय महामार्ग होऊन आता ६ वर्षांचा कालावधी झाला तरीही या ठिकाणी नांदेड परिवहन विभागाकडून नांदेड ते बिदर जळकोट मार्गे बस सेवा सुरू करण्यात आली नाही परंतु येणा-या काही दिवसांमध्ये नांदेड आगारात नवीन बस येणार असून नांदेड-जळकोट-बिदर ही नवीन बस सेवा लवकरच सुरू केली जाईल, असे आश्वासन नांदेड विभागीय […] The post नांदेड-जळकोट- बिदर बस सुरू करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बाबा आमटे राष्ट्रीय पुरस्कार विजेते माधव बावगे यांचा ५ एप्रिल रोजी नागरी सत्कार
लातूर : प्रतिनिधी समाज परिवर्तनाच्या चळवळीला आयुष्य अर्पण करणारे आणि बाबा आमटे राष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी लातूरमध्ये नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थान […] The post बाबा आमटे राष्ट्रीय पुरस्कार विजेते माधव बावगे यांचा ५ एप्रिल रोजी नागरी सत्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रशासनाच्या समन्वयातून १५३ गावांमध्ये मदत
लातूर : प्रतिनिधी सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या ग्रामीण भागातील शेतकरी, महिला व कुटुंबांना आधार देण्यासाठी स्वंयम् शिक्षण प्रयोग (एसएसपी) आणि जेएसडब्लू एनर्जी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापक पूर मदत उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम एकूण १५३ गावांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात आला असून, यामध्ये उपजीविका पुनर्संचयित करणे आणि कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यावर […] The post प्रशासनाच्या समन्वयातून १५३ गावांमध्ये मदत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘नीट’ची तयारी करणा-या विद्यार्थिनीची आत्महत्या
लातूर : प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी लातूरमधील सुतमील भागातील महालक्ष्मी मुलींच्या खासगी वसतिगृहात राहणा-या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने स्वत:च्या खोलीतच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. २८) रात्री १०:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या मागचे कारण अद्याप समजूशकले नसले तरी या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात […] The post ‘नीट’ची तयारी करणा-या विद्यार्थिनीची आत्महत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ज्येष्ठ कलावंतांच्या २ कोटींच्या मानधनावर पाणी ?
लातूर : प्रतिनिधी राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत निवड झालेल्या लातूर जिल्हयातील ३०० लाभार्थ्यांची अंतिम निवड मंजूर यादी सांस्कृतीक कार्यालय, मुंबई येथे जिल्हास्तरीय निवड समितीने सादर केली. या यादीसोबत निवड झालेल्या जेष्ठ साहित्यीक व ककलावंतांच्या बँक खात्यांची यादी जोडने आवश्यक होते. ती अद्याप निवड समितीने पाठवली नसल्याने गेल्या वर्षभरापासून जेष्ठ साहित्यीक व कलावंतांचे […] The post ज्येष्ठ कलावंतांच्या २ कोटींच्या मानधनावर पाणी ? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चैत्र यात्रेने पंढरीनगरी दुमदुमली
अडीच लाखांवर वारकरी, प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची गर्दी पंढरपूर : विशेष प्रतिनिधी अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या चैत्र यात्रा कामदा एकादशीच्या सोहळ््यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून सुमारे दोन ते अडीच लाख भाविकांनी उपस्थिती लावली. हरीनामाचा गजर, दिंड्या पताकांची दाटी आणि टाळ-मृदंगाच्या निनादात अवघी पंढरी दुमदुमून गेली. दर्शनबारीच्या दहा पत्रा शेडपैकी चार पत्रा शेडमध्ये भाविकांची गर्दी होती […] The post चैत्र यात्रेने पंढरीनगरी दुमदुमली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा सत्कार
लातूर : प्रतिनिधी जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्यदक्षपणे कार्य करत असलेल्या श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांना ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम उत्कृष्टरीत्या राबविल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते वर्षा ठाकूर-घुगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे […] The post दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा सत्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून हाडाचा शिक्षक बना
लातूर : प्रतिनिधी एक हाडाचा शिक्षक म्हणजे एखादी पिढी घडवताना तो स्वत: घडत असतो. आपल्या सोबत आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये बदल घडावा यासाठी शिक्षक आग्रही असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून हाडाचे शिक्षक बना, असा सल्ला कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्रा. रमेश भारती यांनी केले. राजमाता जिजामाता बी.एड. महाविद्यालयात द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप […] The post विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून हाडाचा शिक्षक बना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : आयपीएल २०२६ मधील दुस-या सामन्यात मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवत हंगामाची विजयी सुरुवात केली. तब्बल १४ वर्षांनंतर मुंबईने स्पर्धेतील पहिलाच सामना जिंकत चाहत्यांना मोठी भेट दिली. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने दमदार खेळ करत ४ विकेट्स गमावत २२० धावांचा प्रचंड डोंगर उभा केला. मोठे लक्ष्य उभे राहिल्यानंतर मुंबईवर […] The post रोहिट धमाका, मुंबईचा विजय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशात पेट्रोल पंपांवर मिळणार आता रॉकेल
युद्धामुळे दोन महिने नियमांत सूट नवी दिल्ली : वृत्तसंस्था युद्धामुळे एलपीजीच्या पुरवठ्यासंदर्भात केंद्र सरकार विविध उपाययोजना करीत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने पेट्रोल पंपांवर केरोसीन म्हणजेच रॉकेलची विक्री करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला. युद्धामुळे पेट्रोलियम सुरक्षा आणि लायसेसिंग नियमात सूट देण्यात आली असून, या संदर्भात राजपत्र जारी केले आहे. केंद्र सरकारच्या […] The post देशात पेट्रोल पंपांवर मिळणार आता रॉकेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
२ मे ते १४ जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुटी
राज्याच्या शिक्षण विभागाने केली घोषणा मुंबई : प्रतिनिधी राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठीची उन्हाळी सुटी जाहीर झाली आहे. राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांना २ मेपासून सुटी जाहीर करण्यात आली. १४ जूनपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली तर पुढील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्य विदर्भ व इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा १५ जून रोजी सुरु होणार […] The post २ मे ते १४ जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुटी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
१ एप्रिलपासून पॅनकार्डचे नियम बदलणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था येत्या १ एप्रिल २०२६ पासून नवे आर्थिक वर्ष सुरू होत आहे. या नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून अनेक आर्थिक बदल होत आहेत. आयकर कायदा २०२५ च्या तरतुदींची नव्या वर्षात अंमलबजावणी केली जाणार आहे. यात पॅन कार्डची आवश्यकता आणि आर्थिक रक्कम मर्यादा यासंदर्भातील नियमात फेरबदल करण्यात आले आहेत. या बदलांचा प्रमुख उद्देश छोट्या […] The post १ एप्रिलपासून पॅनकार्डचे नियम बदलणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराणची अमेरिकेसमोर अट, भविष्याचीही हमी हवी तेहरान : वृत्तसंस्था अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. अशातच आता हे युद्ध संपविण्यासाठी इराणने अमेरिकेसोबत चर्चेसाठी सशर्त सहमती दर्शवली आहे. ही चर्चा पाकिस्तानमार्फत करण्याचा प्रस्ताव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इराण चर्चेसाठी तयार आहे. मात्र, त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी मांडल्या आहेत. यात सर्वात महत्त्वाची अट […] The post आधी हल्ले थांबवा, मगच चर्चा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात पार पडलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाने सध्या राजकीय वर्तुळात नवा वाद ओढवून घेतला आहे. या कार्यक्रमाच्या बॅनरवर तटकरे कुटुंबातील सदस्यांचे फोटो झळकले, मात्र राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो नसल्याने टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर, अदिती तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच विरोधकांना टोला देखील लगावला आहे. रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा भव्य सत्कार सोहळा 27 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या बॅनरवर सर्वात मोठा फोटो सुनील तटकरे यांचा लावण्यात आला आहे, त्यानंतर अदिती तटकरे व अनिकेत तटकरे यांचा फोटो लावण्यात आला. त्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांचा फोटो लावण्यात आला. मात्र, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार तसेच अजित पवार यांचा फोटो वगळण्यात आला असल्याचे पाहायला मिळाले. यावरून सुनील तटकरे यांच्यावर टीका करण्यात आली होती. यावर आता आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली. नेमके काय म्हणाल्या अदिती तटकरे? या वादावर पडदा टाकताना अदिती तटकरे म्हणाल्या, स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम घेतले जातात, असे अनेक कार्यक्रम दिवसभरात होत असतात. अशाच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले दिवंगत नेते अजितदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी यांचा फोटो नव्हता, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. अजितदादा असतील, सुनेत्राकाकी असतील यांचे आमच्या मनातील स्थान अढळ आहे. बॅनरवरील फोटोतून आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये, असे अदिती तटकरे म्हणाल्या. तरी, यानिमित्ताने एक बरे झाले- स्थानिक कार्यक्रमातील स्थानिक पातळीवर घडलेल्या एका चुकीचा मुद्दा बनवणारी यंत्रणा कशी काम करते हे आमच्या लक्षात आले. हा मुद्दा चवीने चघळणाऱ्यांना दादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल मनातून किती पश्चाताप व्यक्त करावा लागत असेल देव जाणे..! बाकी काकींना पक्षाच्या कुटुंबप्रमुख म्हणून आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार आहेच, असेही अदिती तटकरे यांनी म्हटले. महाराष्ट्र हे सहन करणार नाही- अमोल मिटकरी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील या प्रकराबाबत नाव न घेता सुनील तटकरेंवर निशाणा साधला होता. त्यांनी ट्विट करत म्हटले की, ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही. राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वत: देव बनण्याचा कुणी प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही. रोहित पवारांचा बोचरा वार या प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. रोहित पवार म्हणाले, मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदारच जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावावर करतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे. जे आम्ही वारंवार बोलतोय... यावरून सुनील तटकरे हे पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा पुनरूच्चार रोहित पवारांनी पुन्हा एकदा केला.
गडचिरोली जिल्ह्यात एका आनंदाच्या सोहळ्याचे रूपांतर भीषण शोकांतिकेत झाले आहे. चामोर्शी तालुक्यातील रामपूर येथून लग्नाचा सोहळा आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या स्कॉर्पिओ गाडीला खाजगी ट्रॅव्हल्स बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील कुरुड गावाजवळ रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील सर्व प्रवासी चामोर्शी तालुक्यातील रामपूर येथील एका लग्न समारंभासाठी गेले होते. सोहळा आटपून सायंकाळी सातच्या सुमारास हे वऱ्हाड आपल्या गावी परतत असताना हा अपघात घडला. काही वेळापूर्वी जे वऱ्हाड आनंदाने नाचत-गाजत होते, त्यांच्यावर असा प्रसंग ओढवेल असे कोणालाही वाटले नव्हते, अशी भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. घराच्या उंबरठ्यावर पोहोचण्यापूर्वीच पाच जणांचा प्रवास कायमचा थांबला. स्थानिकांकडून मदतकार्य; जखमींची प्रकृती चिंताजनक अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या गाडीतून जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी मोठी मदत केली. जखमी सहा जणांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महामार्गावर वाहतुकीची कोंडी अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हे ही वाचा… संभाजीनगरमधील गजानन हॉस्पिटलला भीषण आग:अनेक रुग्ण जखमी, सर्व रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले, बचावकार्य युद्धपातळीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध गजानन महाराज मंदिर परिसरात असलेल्या गजानन हॉस्पिटलमध्ये आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेले अनेक रुग्ण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सविस्तर वाचा…
महाराष्ट्र सरकार जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी स्थापन केलेली शासकीय समिती रद्द करण्याच्या तयारीत आहे. या संभाव्य निर्णयाला विवेकवादी आणि प्रागतिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात, या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे. राज्यात बुवाबाजी, शोषण, कर्मकांड आणि अंधश्रद्धांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी २०१३ पासून जादूटोणा विरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती करण्यासाठी एक शासकीय समितीही गठीत करण्यात आली आहे. काही धर्मांध संघटना आणि सत्ताधारी पक्ष एकत्रितपणे ही समिती रद्द करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात, सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकाराने अशा संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक २४ मार्च रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली होती. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ आणि विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार होते. मात्र, नाशिक येथील बुवाबाजी करणारा कॅप्टन अशोक खरात याला अटक झाल्याने ऐनवेळी ही बैठक रद्द करण्यात आली. या विषयावर सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे जादूटोणा विरोधी कायद्याची आणि अंधश्रद्धा निर्मूलन कार्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. समिती रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास जनक्षोभ निर्माण होऊ शकतो, असे वाटल्याने सामाजिक न्याय विभागाने बैठक रद्द केल्याचे समजते. महाराष्ट्राच्या विधिमंडळात जवळपास दोन दशके या कायद्याची मागणी करण्यापासून ते तो मंजूर करून घेण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विविध आंदोलने केली होती. याच काळात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची कायद्याला विरोध करणाऱ्या शक्तींकडून हत्या करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर, जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही समिती अस्तित्वात असणे अत्यंत आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवावे, अशी विनंती निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे. यावेळी निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये आम्ही भारतीय महिला समितीच्या प्रा. कुमुदिनी वाडेकर, समाजसेविका रजिया सुलताना, आम्ही भारतीय जनसांस्कृतिक चळवळीचे राज्य समन्वयक डॉ. प्रकाश मानेकर, विदर्भ जनआंदोलन समितीचे विदर्भ संघटक प्रा. डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत, डॉ. पद्माताई राजपूत, अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव हरीश केदार, प्रकाश कळसकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला कार्यवाह गायत्री आडे, राष्ट्र सेवादलाचे राज्य उपाध्यक्ष प्रा. संदीप तडस, सुनील घटाळे, धर्मेंद्र भांडारकर, प्रा. गंगाधर नाखले, माधव गिरी, प्रा. शरद पुसदकर आणि मराठी विज्ञान परिषदेचे प्रा. प्रवीण गुल्हाने यांच्यासह अनेक विवेकवादी व प्रागतिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवांना मिळणाऱ्या प्रतिसादानंतर, राज्यातील सर्वात मोठा पुस्तक महोत्सव आगामी ऑक्टोबर महिन्यात अमरावती येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली. येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आणि जिल्हास्तरीय पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभाताई खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी आणि सहायक संचालक राजेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, मानवी जीवनात पुस्तकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुस्तकांमुळे समाज प्रगल्भ होतो आणि अनेक क्रांती घडतात. त्यामुळे जिल्ह्यात वाचन चळवळ निर्माण करण्यासाठी 'गाव तिथे ग्रंथालय' हा उपक्रम राबविण्यात येईल. यासाठी गावातील विनावापर इमारतींची दुरुस्ती करून तेथे वाचनालये सुरू केली जातील, ज्यामुळे प्रत्येक गावात वाचनाची चळवळ उभी राहण्यास मदत होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी यांनी केले, तर सहायक संचालक राजेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. दरम्यान, नव्याने तयार झालेल्या या इमारतीमध्ये वाचन चळवळ निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील. ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करून येथे डिजिटल लायब्ररीही निर्माण करण्यात येणार आहे. प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या डिजिटल लायब्ररीचा उपयोग होईल. यासोबतच, स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आणि मॉड्यूलर अभ्यासिका उभारण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही यावेळी सांगण्यात आले.
अमरावती शहरातील बडनेराकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता दुभाजकांची स्थिती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या दुभाजकांचा काही ठिकाणी आदर्श वापर केला जात असताना, इतर ठिकाणी त्यांची दुरवस्था झाली असून, चक्क घरगुती कपडे वाळवण्यासाठी त्यांचा वापर होत आहे. यामुळे नागरिकांनी संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या महामार्गावरील दुभाजकांमध्ये मोठा विरोधाभास दिसून येतो. एका बाजूला, दुभाजकांच्या मधोमध सुंदर फुलझाडे आणि इतर वनस्पतींचे रोपण करून त्यांची निगा राखली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला, याच दुभाजकाचा काही भाग नागरिकांकडून कपडे सुकवण्यासाठी वापरला जात आहे, ज्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत आहे. रस्ता दुभाजकांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या सुस्तपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे. 'स्वच्छ अमरावती-सुंदर अमरावती' चा पुरस्कार मिळालेल्या शहरात अशी विसंगती यंत्रणेला लाजवणारी असल्याचे मत व्यक्त होत आहे. अमरावती-बडनेरा हा राष्ट्रीय महामार्ग शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावर अनेक शाळा-महाविद्यालये, नामांकित कंपन्यांचे शोरूम्स आणि प्रमुख बाजारपेठ आहेत. तसेच, बडनेरा रेल्वे स्थानकाकडे जाणारे प्रवासी आणि छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसही याच महामार्गावरून जातात. या महत्त्वाच्या मार्गावरील दुभाजकांची ही स्थिती प्रवाशांना आणि नागरिकांना अमरावतीकरांच्या जागरूकतेबद्दल प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन दुभाजकांची योग्य निगा राखावी आणि त्यांची दुरवस्था थांबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मेळघाटातील पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंतच्या शिक्षणात अनेक अडथळे आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी आमदार संजय खोडके यांनी पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने ते लवकरच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), धारणीचे प्रकल्प संचालक (पीओ) आणि आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त (एटीसी) यांची संयुक्त बैठक घेणार आहेत. त्यानंतर शासकीय पातळीवरील उपाययोजनांसाठी ते पालकमंत्र्यांसोबतही चर्चा करतील. मेळघाट शिक्षण विकास समितीच्या वतीने येथील गो. ग. राठी जिल्हा क्षय रुग्णालयानजीकच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सुमारे तीन तास शिक्षण विषयावर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतरच आमदार खोडके यांनी संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय जाहीर केला. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे डेप्युटी सीईओ विलास मरसाळे, शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, तक्षशिला महाविद्यालयाचे प्राचार्य कमलाकर पायस, शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण खांडेकर आणि एटीसी कार्यालयाच्या सहायक आयुक्त यांसारखे मान्यवर उपस्थित होते. आमदार खोडके यांनी यावेळी सांगितले की, मेळघाट म्हणजे केवळ कुपोषण हा एकच विषय बाहेर येतो, परंतु शिक्षणातही अनेक उणीवा असल्याचे समोर आले आहे. या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी धारणी येथे सर्व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली जाईल. या बैठकीत शिक्षणातील अडथळे दूर करण्याच्या स्थानिक उपाययोजना निश्चित केल्या जातील. तसेच, शासकीय पातळीवरील उपाययोजनांसाठी पालकमंत्र्यांकडे मागणी केली जाईल. विद्यार्थ्यांचे शिक्षण (केजी टू पीजी) सुधारण्याच्या उद्देशाने आयोजित या संवाद कार्यशाळेत इतर मान्यवरांनीही आपली भूमिका मांडली. कार्यशाळेत मेळघाटातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन आणि विद्यापीठस्तरीय शिक्षणातील प्रश्न, समस्या आणि त्यावरच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रारंभी मेळघाटातील ‘खोज’ संस्थेचे प्रवर्तक ॲड. बंड्या साने (बाबा) व ॲड. ब्रदर जोस, तसेच अपेक्षा होमीओ सोसायटीच्या प्रतिनिधी ज्योत्सना लोहकरे यांनी शिक्षण क्षेत्राचे वास्तव चित्र मांडले. चर्चेदरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांनी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणाची भाषा, शिक्षणाची गुणवत्ता आणि अडकलेली शिष्यवृत्ती यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांची मांडणी केली. या मुद्द्यांमुळे आमदार खोडके आश्चर्यचकित झाले. मेळघाटातील पालकांनी सकाळच्या शाळा नकोत अशी मागणी केली आहे. तेथील थंड वातावरणामुळे शाळा दुपारी भरवाव्यात, असे त्यांचे म्हणणे आहे. शाळा व्यवस्थापन समितीला शिक्षक आणि पालकांच्या सहभागाने या बदलाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असतो.
एसटी बसच्या तिकीट दरात सवलत मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या 'स्मार्ट कार्ड'साठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) जाहीर केल्यानुसार, ३१ मार्च ही स्मार्ट कार्ड काढण्याची अंतिम मुदत आहे. यामुळे कार्ड काढण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार, ७५ वर्षांखालील महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळते, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ पुरुष आणि महिलांना १०० टक्के सवलत दिली जाते. यापुढे ही सवलत मिळवण्यासाठी संबंधित प्रवाशांकडे स्मार्ट कार्ड असणे अनिवार्य करण्यात आले आहे. अमरावती येथील मध्यवर्ती बसस्थानकावर दररोज ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी गर्दी होत आहे. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी वयाचा दाखला, महाराष्ट्रातील अधिवासाचा पुरावा (आधार कार्ड) आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन नागरिक सकाळपासून रांगेत उभे राहत आहेत. कार्डसाठी २०० रुपये शुल्क आकारले जात असून, हे काम एका खासगी संस्थेकडे सोपवण्यात आले आहे. फलाट क्रमांक एक व दोनवर पोलीस संरक्षणात कार्ड दिले जात आहेत. तिकीट दरातील सवलत केवळ महाराष्ट्रातील रहिवाशांनाच मिळावी, यासाठी महामंडळाने 'कॉमन मोबिलिटी कार्ड' (स्मार्ट कार्ड) योजना सुरू केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक नागरिक अजूनही या कार्डपासून वंचित असल्याने, कार्ड मिळवण्याचा कालावधी वाढवून देण्याची मागणी पुढे आली आहे. स्मार्ट कार्ड देण्यामागे एसटी महामंडळाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. एसटी बसेस महाराष्ट्राबाहेरही धावतात आणि इतर राज्यातील प्रवासीही त्यांचा वापर करतात. मात्र, सवलतीची योजना केवळ राज्यातील जनतेसाठी असल्याने, परराज्यातील प्रवाशांना पूर्ण तिकीट दर आकारला जावा, हे महामंडळाचे ध्येय आहे.
अमरावती येथील नव्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी रविवार, २९ मार्च रोजी सकाळी पदभार स्वीकारला. मात्र, पदभार स्वीकारताच त्यांना तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यासाठी रवाना व्हावे लागले. शासनाने त्यांना अमरावती येथे येण्यापूर्वीच तमिळनाडूच्या निवडणूक निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली होती. निवडणुकीच्या कामकाजाला प्राधान्य द्यायचे असल्याने त्या तात्काळ तमिळनाडूसाठी रवाना झाल्या आहेत. अमरावती येथील कामकाज त्या ऑनलाईन पद्धतीने सांभाळणार आहेत. यापूर्वी त्या राज्याच्या महिला व बालविकास आयुक्त म्हणून पुण्यात कार्यरत होत्या. पुण्याहून अमरावती येथे पोहोचताच त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी अपर आयुक्त सूरज वाघमारे, उपायुक्त अजय लहाने, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर इतर उच्चाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे स्वागत केले. यामध्ये तिन्ही स्वीय सहायक अतुल बुटे, संतोष अग्रवाल, अतुल लवणकर यांचा समावेश होता. नव्या आयुक्त नयना गुंडे यांनी यापूर्वी विदर्भात गोंदिया येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. एक उत्कृष्ट सनदी अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का वाढावा, यासाठी त्या नेहमी आग्रही राहिल्या आहेत. दरम्यान, आधीच्या विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल ह्या सोमवारी (उद्या) नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी रवाना होणार आहेत. शासनाने त्यांची बदली महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) या पदावर केली आहे. डॉ. श्वेता सिंघल यांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी अमरावतीच्या विभागीय आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक निरीक्षक पदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी तमिळनाडूला रवाना झालेल्या विभागीय आयुक्त नयना गुंडे पुढील महिन्याच्या २५ तारखेला परत येतील. तमिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे, तर ४ मे रोजी मतमोजणीअंती निकाल घोषित केला जाईल. मतदान आटोपल्यानंतर त्या २५ एप्रिल रोजी अमरावती येथे परतून आपले नियमित कामकाज सांभाळतील, अशी शक्यता आहे. निकालाच्या आधी त्यांना पुन्हा तमिळनाडू येथे जावे लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
बिबट्याने धुमाकूळ घालत तीन तरुणांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याने कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात खळबळ उडाली आहे. कारखान्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर (ता. कराड) गावात या थरारक घटना घडल्या आहेत. शेतात पाणी पाजत असताना बिबट्याच्या हल्ल्यात निखिल मारुती वांगडे, जयवंत बबन फसाले आणि सौरभ श्रीकांत कदम, हे तीन तरूण जखमी झाले आहेत. जखमींवर कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने ट्रॅप कॅमेरे आणि पिंजराही लावला आहे. शहापूर ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल वांगडे हा मोठ्या कॅनाल जवळच्या शिवारातील उसाच्या शेतात पाणी पाजत असताना शनिवारी दुपारी साडे चारच्या सुमारास बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. उपचारासाठी त्याला तातडीने कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रविवारी सकाळी शेतात पाणी पाजत असताना जयवंत बबन फसाले या तरुणावरही बिबट्याने हल्ला केला. त्यात तो देखील जखमी झाला असून त्यालाही उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. वन अधिकारी पाहणी करत असताना तिसरा हल्ला या दोन घटनांमुळे वन अधिकारी घटनास्थळी पाहणी करून पिंजरा लावण्याची तयारी करत होते. त्यामुळे बहुतांश शेतकरी त्याठिकाणी उपस्थित होते. तोवर खालच्या शिवारात बिबट्याने सौरभ कदम या तरुणावर हल्ला केला. त्यात त्याचे डोके, चेहरा आणि हात रक्तबंबाळ झाला. बिबट्याला हुसकावून लावल्यानंतर जखमी अवस्थेत तो घरी आला. कुटुंबीय त्याला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात घेऊन आले. बिबट्यासाठी लावण्यात आला पिंजरा सह्याद्री कारखान्यापासून शहापूर गाव हाकेच्या अंतरावर असल्याने बिबट्याने धुमाकूळ घातल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. शहापूर ग्रामस्थांनी वन विभागाला कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील या पथकासमवेत घटनास्थळी दाखल झाल्या. परिसराची पाहणी केल्यानंतर शेतात वावरताना काय काळजी घ्यायची, याबद्दल त्यांनी सूचना केल्या. तसेच घटना घडलेल्या परिसरात ट्रॅप कॅमेरे आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजराही लावण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात येणाऱ्या बांपेवाडा आणि उमरझरी परिसरात नरभक्षक वाघिणीने गेल्या काही दिवसांपासून प्रचंड दहशत निर्माण केली आहे. या वाघिणीच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. वाघिणीचा वावर असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले असून, प्रशासनाच्या संथ कारभाराविरोधात संतप्त नागरिकांनी साकोली–तिरोडा मार्ग २९ मार्च रोजी रोखून धरला होता. दोन आठवड्यांत दोन मोठे हल्ले दिनांक १९ मार्च रोजी बांपेवाडा येथील ५० वर्षीय वसंता मेश्राम यांच्यावर वाघिणीने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले होते.या घटनेची शाई वाळते न वाळते तोच,२८ मार्च रोजी उमरझरी येथील ५५ वर्षीय माया रामकृष्ण सोनवाने यांच्यावर वाघिणीने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात माया सोनवाने गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. एकामागून एक होत असलेल्या या प्राणघातक हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात नरभक्षक वाघिणीची मोठी दहशत निर्माण झाली आहे. ग्रामस्थांचा संताप आणि जाळपोळ जखमी माया सोनवाने यांना वनविभागाकडून वेळेत मदत आणि उपचार न मिळाल्याचा आरोप करत ग्रामस्थांचा संयम सुटला. संतप्त नागरिकांनी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.नेपाल रंगारी यांच्या नेतृत्वात प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत साकोली–तिरोडा मार्ग पूर्णपणे बंद केला. आंदोलनादरम्यान संतप्त जमावाने जाळपोळही केली, ज्यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. जोपर्यंत या नरभक्षक वाघिणीचा बंदोबस्त होत नाही आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. वन विभागाची शोधमोहीम तीव्र घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाने वाघिणीला जेरबंद करण्यासाठी कंबर कसली आहे. परिसरात तातडीने पिंजरे लावण्यात आले असून शीघ्र कृती दल भंडाराच्या टीमला बोलाविण्यात आले आहे. वाघिणीवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात तात्पुरता टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच, नरभक्षक वाघीण दिसताच तिला ट्रॅंक्विलायझर गनद्वारे बेशुद्ध करून पकडण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाचे आवाहन आणि सतर्कता सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिस आणि वन विभागाचे पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. वाघिणीला पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि ड्रोनचा वापर करण्याबाबतही हालचाली सुरू आहेत. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे गावकऱ्यांवर वारंवार हल्ला करणाऱ्या वाघाला जेरबंद करून हलविण्यात येईल. जखमी माया सोनवणे यांना वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांनी खासगी दवाखान्यात घेऊन गेले नसल्याने त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे. जखमीला पुढील उपचारासाठी नागपूर येथील जी.बी.रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. उपचाराचा खर्च वनविभाग भंडारा करेल. जखमीला आर्थिक साहाय्य मिळण्याकरिता शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात येईल. शिवणटोला येथून होणारी जडवाहतूक सुरू करण्याकरिता उपसंचालक साकोली हे लवकरच बैठक घेऊन त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार पुढील दिशा ठरवतील. गावाच्या शेती भोवती लोखंडी जाळीचा कुंपणाचा प्रस्ताव वनविभाग भंडारा यांच्याकडे सादर करण्यात येईल. गावकऱ्यांच्या चर्चेनुसार नव्याने होत असलेल्या बफर क्षेत्रास गावकऱ्यांचा विरोध होत असून यावर चर्चा करण्यासाठी तत्काळ सभा घेऊन गावकऱ्यांचे समाधान करण्यात येईल. शासनमान्य मजुरी गावातील महिलांना मिळाली नसल्याने त्यांना त्यांची उर्वरित रक्कम अदा करण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल व त्यांची मजुरी अदा करण्यात येईल. आठ दिवसांत या मागण्या निकाली काढल्या जातील, असे लेखी आश्वासन सहाय्यक वनसंरक्षक मनीषा चव्हाण यांनी २९ मार्च रोजी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयू) नुकतीच राष्ट्रीय आयडियाथॉन ३.० स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. याप्रसंगी टाटा टेक्नॉलॉजीसचे प्रकल्प संचालक बालाजी मुंढे यांनी नवकल्पना हाच प्रगतीचा एकमेव मार्ग असल्याचे प्रतिपादन केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठाने (पीसीयू) या राष्ट्रीय स्तरावरील आयडियाथॉनचे आयोजन केले होते. मुंढे म्हणाले की, आपण जुन्या विचारांकडे परत जाऊ शकत नाही, नवकल्पना हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. भूतकाळातून शिकवण घेऊन भविष्य घडवण्याची ताकद या नवकल्पनांमध्ये आहे. यावेळी टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर डॉ. रंगा श्रीनिवास गुंटी, पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांच्यासह डॉ. अनिल महेश्वरी, डॉ. शंकर देवसरकर, डॉ. भारत काळे, डॉ. विजय पाटील, विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आयडियाथॉन ३.० मध्ये देशभरातील एकूण ४० संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्रातून ३० संघ तर इतर राज्यांतून १० संघांचा समावेश होता. कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले की, नवकल्पना ही केवळ एक कृती नसून, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये विकसित होणारी विचारसरणी आहे. आयडियाथॉनसारखे उपक्रम विद्यार्थ्यांना नोकरी शोधण्याऐवजी निर्माते बनवतात. त्यांच्या या विचारांतून पीसीयूचा नवकल्पना आणि उद्योजकता विकसित करण्याचा दृढ संकल्प दिसून आला. सहभागी संघांनी प्रचंड ऊर्जा, जिद्द आणि नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला: प्रथम क्रमांक व्हिआयटी पुणे (५० हजार रुपये रोख), द्वितीय क्रमांक पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) (३० हजार रुपये रोख) आणि तृतीय क्रमांक डी.जे. संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (२० हजार रुपये रोख). विजेत्या संघांना प्रशस्तीपत्र, पारितोषिक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर शहराच्या सर्वांगीण, नियोजित आणि शाश्वत विकासासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिक, उद्योग आणि विविध संस्थांच्या सहभागातूनच हा विकास अधिक प्रभावीपणे साध्य होईल, असे प्रतिपादन महापौर समीर राजूरकर यांनी केले. शहरातील विविध उद्योग, व्यापारी आणि सामाजिक संघटनांचा समावेश असलेल्या 'टीम ऑफ असोसिएशन्स'तर्फे महापौर समीर राजूरकर आणि स्थायी समिती सभापती अनिल माकरिये यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास सीएसएन फर्स्टचे अध्यक्ष रितेश मिश्रा, सीएमआयएचे मानद सचिव मिहिर सौन्दलगेकर, तसेच शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महापौरांनी शहराच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा मांडला. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधा, सेवा आणि व्यवस्थापन यामध्ये व्यापक सुधारणा करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतुकीच्या समस्येवर उपाय म्हणून जालना रोडवरील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. लेफ्ट टर्न फ्री करण्याच्या उपक्रमामुळे सुमारे २५ टक्के वेळेची बचत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या योजनांना गती देण्यात आली असून, लवकरच नागरिकांना दिलासा मिळेल, असे महापौरांनी सांगितले. तसेच विकास आराखड्यातील (डीपी प्लॅन) रस्त्यांमधील त्रुटी दूर करून अधिक सक्षम आणि सुटसुटीत रस्ते जाळे उभारण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातही सुधारणा करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आगामी काळात शहर अधिक स्वच्छ आणि सुबक दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी नवीन मालमत्तांचा शोध घेतला जात असून, विकासकामांसाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हॉकर्स धोरण प्रभावीपणे राबवून आठवडी बाजारांच्या ऐवजी नियोजित आणि स्थायी बाजारपेठा विकसित करण्याचा मानस आहे. यामुळे व्यापाराला चालना मिळेल आणि शहरातील शिस्तबद्धता वाढेल. तसेच शहराच्या सौंदर्यीकरणासाठी दुकानांच्या फलकांसाठी एकसमान पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटन विकासालाही विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. जागतिक स्तरावर शहराची ओळख निर्माण करण्यासाठी आयटीबी बर्लिन या आंतरराष्ट्रीय पर्यटन मंचावर स्वतंत्र स्टॉल उभारण्याचा मानस आहे. तसेच १२ हेरिटेज वॉक्स आणि पर्यटनासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून शहराच्या समृद्ध वारशाचा प्रचार-प्रसार केला जाणार आहे. कार्यक्रमादरम्यान सीएसएन फर्स्टचे अध्यक्ष रितेश मिश्रा आणि सीएमआयएचे मानद सचिव मिहिर सौन्दलगेकर यांनी शहराच्या विकासासाठी 'सिटीझन चार्टर' लागू करण्याची जोरदार मागणी केली. विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी निश्चित कालमर्यादा, पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत लांडगे यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर येथे वाढत्या गॅस टंचाई, दरवाढ आणि रिक्षाचालकांना भेडसावणाऱ्या अडचणींच्या निषेधार्थ शहरातील सर्व ऑटो रिक्षा संघटनांनी रविवार, ३० मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे सोमवारी शहरातील रिक्षा सेवा बंद राहणार आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना नेते आणि राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सर्व संघटनांनी एकत्र येऊन आंदोलनाची दिशा निश्चित केली. रिक्षा चालक संघटनांनी प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये गॅसचा साठा उपलब्ध असेपर्यंत पंपांनी २४ तास सुरू राहावे, गॅस भरल्यानंतर अधिकृत पावती देणे बंधनकारक करावे, ‘ऑनलाईन पेमेंट’ची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि गॅस साठ्याची माहिती पंपाच्या दर्शनी भागात ठळकपणे दर्शवावी, या मागण्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र वाहतूक सेना, भीम सेना रिक्षा संघटना, रोशन ऑटो रिक्षा युनियन, भीमशक्ती रिक्षा चालक संघ, मराठवाडा रिक्षा युनियन, ऑटो रिक्षा युनियन आणि कल्याणकारी वाहतूक संघटना या प्रमुख संघटनांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाच्या बैठकीला सलीम खामगावकर, बळीराम प्रधान, मोहिनी इनामदार, गजानन वानखेडे, मोहसीन शेख, इम्रान पठाण, शेख सरवर, दत्ता नागरे, वसीम सिद्दिकी, शरद वाडोरे, गौतम सूर्या, सय्यद कौशुद्दीन, रेखा सोनवणे, अनिता कटकुरे, मनोज साळवे, सोमनाथ साळवे, सय्यद अली आणि सय्यद मझहर यांसारखे विविध पदाधिकारी उपस्थित होते. अंबादास दारवेंचे गंभीर आरोप आणि इशारा
भोंदू अशोक खरात प्रकरणात आता दररोज नवनवीन खुलासे होत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले आहेत. अशोक खरात आणि शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांच्यातील दुव्याचे फोटो पुराव्यासह सादर करत, अंधारे यांनी या प्रकरणात 'ब्लॅक मनी व्हाईट' करण्याचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला आहे. केसरकरांसोबत प्रत्येक फोटोत दिसणारा तो 'पिवळ्या शर्टाचा' माणूस नेमका कोण? असा सवाल अंधारे यांनी केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरात प्रकरणात ठाकरे गटाकडून याआधी देखील शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांचे खरातसोबतचे फोटो दाखवत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दीपक केसरकर यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. अशोक खरात प्रकरणाशी माझा संबंध नसल्याचे सांगत, त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. राजकीय द्वेषापोटी माझ्याविरोधात कट कारस्थान असल्याचे दीपक केसरकर म्हणाले होते. आज सुषमा अंधारे यांनी पुन्हा काही फोटो समोर आणून मोठे दावे केलेत. नेमके काय म्हणाल्या सुषमा अंधारे? सुषमा अंधारे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत काही छायाचित्रे दाखवली. यात एक पिवळा शर्ट घातलेला व्यक्ती प्रत्येक ठिकाणी केसरकर आणि अशोक खरात यांच्यासोबत दिसत आहे. नामकर्ण एकनाथ आवारे असे त्या व्यक्तीचे नाव आहे. अंधारे म्हणाल्या, मी आधीही एमआयडीसी गेस्टहाऊसमधील फोटो दाखवले होते. हा माणूस केसरकरांसोबत नेमका काय करतोय? इतकेच नाही तर चाकणकर जेव्हा खरातची पाद्यपूजा करत होत्या, तेव्हाही हा व्यक्ती तिथे हजर होता. या माणसाचे नाव नामकर्ण एकनाथ आवारे असून तो 'जगदंब पतसंस्थेचा' प्रमुख आहे, अशी माहिती अंधारे यांनी उघड केली. काळा पैसा पांढरा करण्याचा आरोप नामकर्ण आवारे याच्या भूमिकेवर संशय व्यक्त करताना सुषमा अंधारे यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, मी जेव्हा या आवारेची माहिती घेतली, तेव्हा अनेक बड्या नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे 'ब्लॅक मनी' जगदंब पतसंस्थेमार्फत 'व्हाईट' करण्याचे काम हा माणूस करतो, असे दबक्या आवाजात बोलले जाते. जो माणूस अशा व्यवहारांसाठी ओळखला जातो, तो केसरकरांसोबत वारंवार का दिसतो? आवारे, खरात आणि केसरकर यांच्यात कोणते आर्थिक व्यवहार सुरू आहेत, याचे उत्तर केसरकरांनी दिले पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. केसरकरांचा दावा बालिश आणि हास्यास्पद दीपक केसरकर यांनी आपल्यावर होत असलेले आरोप हे 'कट कारस्थान' असल्याचे म्हटले होते. पण सुषमा अंधारे यांनी हा आरोप फेटाळून लावला. यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, केसरकर म्हणतात माझ्याविरोधात कारस्थान सुरू आहे, पण हे ऐकून मला दुःख वाटत नाही, तर त्यांचे विधान बालिश आणि हास्यास्पद वाटते. जर ते विचारत असतील की ३९ लोक सोडून मलाच का लक्ष्य केले जात आहे? तर याचा अर्थ असा होतो की, केसरकर स्वतः मान्य करत आहेत की ते अशोक खरातच्या संपर्कात होते. केसरकरांनी 'भांडाफोड करेन' अशी पोकळ धमकी देण्यापेक्षा, त्या ३९ लोकांची नावे एकदाची सांगूनच टाकावीत, असे थेट आव्हान सुषमा अंधारे यांनी दिले.
परसोडी ते साकोली या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी वारंवार मागणी करूनही प्रशासनाला जाग येत नाही. या मार्गावर अनेक किरकोळ अपघात घडले आहेत. रविवार २९ मार्चला दुपारी १२:२० वाजता परसोडी - साकोली बस याच उखडलेल्या रस्त्यावरून दुसऱ्या वाहनाला रस्ता देण्याच्या नादात रोडखाली उतरून झाडावर आदळली. बसमध्ये लहान मुलांसह एकूण २१ प्रवासी बसलेले होते. त्यात १७ प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साकोली आगाराची बस क्र. एम एच ४०/वाय ५२०७ ही परसोडीवरून ते साकोलीकडे येत होती. रविवारी १२:२० ला पहाडीच्या उतार मार्गावर अत्यंत खराब रस्तामुळे व दुसऱ्या दूचाकींना मार्ग देण्याच्या नादात बसचालकाचे संतुलन बिघडले व ही बस रोडखाली उतरून झाडावर आदळली. या अपघातात बसमधे असलेल्या २१ पैकी १७ प्रवाशांना किरकोळ जखम झाली. यावेळी उपस्थित नागरिकांनी अन्य वाहनातून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच साकोली पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी चमूंसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. खराब रस्त्यामुळे अपघात झाल्याचा आरोप परसोडी ग्रामपंचायतचे सदस्य तुळशीदास पटले व पप्पू भांडारकर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाला हा अत्यंत खराब झालेल्या व उखडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केलेली आहे, पण प्रशासनाला जाग येत नाही अशी माहिती दिली. एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच हा रोड दुरूस्त होईल काय? असा थेट सवाल दोन्ही ग्रामपंचायत सदस्य पटले व भांडारकर यांनी उपस्थित केला आहे. रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा परसोडी - उमरी या अत्यंत क्षतिग्रस्त रस्त्याची दुरुस्ती दोन दिवसात न झाल्यास आम्ही गावकऱ्यांसह आंदोलन करू असा इशारा ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास पटले व पप्पू भांडारकर यांनी घटनास्थळावरून दिला आहे. साकोली पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक एम. पी.आचरेकर यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रशांत वडूले करीत आहेत.
पुणे सीमाशुल्क विभाग यांनी मोठी कारवाई करत सुमारे 26.80 कोटी रुपये किमतीचा 76.58 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. ही कारवाई पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो विभागात करण्यात आली. थायलंडहून आलेली आयात वस्तू मध्ये ‘मँडरीन संत्र्याच्या पिशव्या’ म्हणून घोषित करण्यात आली होती. हा माल पांढऱ्या थर्मोकोलच्या खोक्यांमध्ये पॅकिंग करण्यात आला होता. स्कॅनिंगदरम्यान प्रतिमा संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी एक खोका उघडून तपासणी केली. तपासणीदरम्यान सीलबंद टिनचे डबे आढळले. त्यामध्ये मिठासारखी पांढरी दाणेदार पावडर दिसून आली. पुढील तपासात त्या पावडरमध्ये लपवलेले व्हॅक्यूम सील प्लास्टिक पॅक सापडले, ज्यामध्ये हायड्रोपोनिक गांजा ठेवण्यात आला होता. यानंतर संपूर्ण खोकी तपासण्यात आली आणि एकूण 76.58 किलो गांजा जप्त करण्यात आला. या मालाची किंमत भारतीय अवैध बाजारात सुमारे 23.80 कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले.सीमाशुल्क विभागाने तत्काळ शोधमोहीम सुरू केली असून आतापर्यंत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. हायड्रोपोनिक गांजा म्हणजे काय? हायड्रोपोनिक गांजा म्हणजे मातीशिवाय पाण्यात आणि विशेष पोषक द्रव्यांच्या सहाय्याने उगवलेला कॅनॅबिस होय. या आधुनिक शेती पद्धतीला हायड्रोपोनिक्स असे म्हटले जाते. या तंत्रामध्ये तापमान, प्रकाश, आर्द्रता आणि पोषक द्रव्यांचे प्रमाण नियंत्रित ठेवून वनस्पतींची वाढ केली जाते, त्यामुळे तयार होणारा गांजा अधिक दर्जेदार आणि प्रभावी मानला जातो.
युद्ध सुरू असताना रशिया पूर संकटात; ३ लाख लोक अडकले
मॉस्को : वृत्तसंस्था आखाती प्रदेशात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे, त्याचबरोबर रशियादेखील युक्रेनसोबतच्या युद्धात व्यस्त आहे. अशातच आता रशियावर निसर्गाची अवकृपा पहायला मिळत आहे. युक्रेन युद्धात अनेक वर्षे अडकलेल्या रशियावर आता नवीन संकट कोसळले आहे. देशाच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी वीजपुरवठाही पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यामुळे पुतिन सरकारची […] The post युद्ध सुरू असताना रशिया पूर संकटात; ३ लाख लोक अडकले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमेरिका, युरोपीय देशांत ‘नो किंग्स’ मोहीम
वॉशिंग्टन : इराणविरोधात युद्ध पुकारल्याने जगभरातील देशांना याचा त्रास सहन करावा लागतोय. परिणामी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात रोष वाढत गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तसेच, त्यांच्या विविध धोरणांविरोधात शनिवारपासून अमेरिका आणि युरोपमध्ये ‘नो किंग्स’ रॅलींच्या माध्यमातून लाखो लोकांनी निदर्शने केली. या आंदोलनाचे मुख्य केंद्र मिनेसोटा होते. सेंट पॉल येथील मिनेसोटा कॅपिटलच्या मैदानावर आणि आसपासच्या […] The post अमेरिका, युरोपीय देशांत ‘नो किंग्स’ मोहीम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हॅमहंग : इराण आणि अमेरिका युद्ध पेटलेले असतानाच आता अमेरिकेत खळबळ उडाली. अमेरिकेला मोठा धक्का बसला. एकीकडे इराणसोबतच्या युद्धाचे टेन्शन आहे तर दुसरीकडे आता उत्तर कोरियाने पुन्हा एकदा अमेरिकेची धडधड वाढवली आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उनने पुन्हा एकदा जगाचेही टेन्शन वाढवले आहे. सरकारी मीडियाच्या रिपोर्टनुसार, रविवारी उत्तर कोरियाने उच्च क्षमता असलेल्या इंजिनचे परीक्षण […] The post किम जोंगने उडवली जगाची झोप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बालाघाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
बालाघाट : बालाघाटात शनिवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेली एक कार अनियंत्रित झाली आणि तिला अचानक आग लागली; आगीचा प्रचंड लोळ उठल्याने ती कार अक्षरश: आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या दुर्घटनेत कारमध्ये अडकलेल्या तीन प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. दरम्यान, अन्य दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या, तर ८ वर्षांची एक चिमुरडी मात्र यातून […] The post बालाघाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तब्बल ३० सिलिंडर घेऊन डिलिव्हरी बॉयचा पोबारा
विशाखापट्टणम : पश्चिम आशियातील तणावामुळे भारतातील नागरिकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच शहरातील नागरिक गॅस टंचाईचा सामना करत असताना डिलिव्हरी बॉयने तब्बल ३० सिलिंडरवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशाखापट्टणम येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी या डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाय. अप्पा राव असे या […] The post तब्बल ३० सिलिंडर घेऊन डिलिव्हरी बॉयचा पोबारा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
३ बड्या नेत्यांची काँग्रेसमध्ये एन्ट्री
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे माजी आमदार राजकुमार ठुकराल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून बसपाचे माजी आमदार नारायण पाल यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसची ताकद वाढत असल्याची चर्चा आहे. राजकुमार ठुकराल यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा […] The post ३ बड्या नेत्यांची काँग्रेसमध्ये एन्ट्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्यामुळेच गायनात सुवर्णमध्य साधण्याची कला अवगत झाल्याचे ज्येष्ठ गायक पंडित अरुण द्रविड यांनी सांगितले. ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्तर्फे आयोजित ‘परंपरा’ या सांगीतिक मालिकेत ते बोलत होते. सुरांना पारिजातकाच्या फुलांप्रमाणे समजून त्यांना नजाकतीने कुरवाळणे आवश्यक असते, असे किशोरीताई आम्हा शिष्यांना सांगत असत. गाताना केवळ व्याकरणावर लक्ष केंद्रित न करता त्यातील सौंदर्यविचार आणि भावसौंदर्य समजून उमजून गायन करावे, असे त्यांचे मार्गदर्शन होते. पंडित द्रविड यांनी आपला सांगीतिक प्रवास उलगडताना सांगितले की, सर्व घराण्यांचे संगीत ऐकून ते आत्मसात करत आपल्या गायनातून नवीन विचार मांडणे आवश्यक आहे. जयपूर घराण्याच्या गायकीचा पाया भक्कम करण्यात मजीद खाँसाहेब यांचा मोठा वाटा होता. त्यांनी जयपूर घराण्यातील तानांमधील गमक, बलस्थाने आणि आकार लावण्याची तालीम दिली. किशोरीताईंसह त्यांच्या गुरू व आई मोगुबाई कुर्डिकर यांचे देखील मला मार्गदर्शन लाभले. जयपूर घराण्यातील शिस्तबद्ध रागस्वरूप सांभाळत, व्याकरणाचा सखोल अभ्यास करत गायकीतील सौंदर्यविचार आणि कलाकुसर दाखविणे ही सुवर्णमध्य साधण्याची कला किशोरीताईंमुळे माझ्या गायनात आली, असे पंडित द्रविड यांनी नमूद केले. मोगुबाई कुर्डिकर यांची तालीम किशोरीताईंच्या गाण्यात दिसते, त्याचबरोबर किशोरीताईंच्या अंतर्मनातील विचार, भावनात्मकता आणि उत्कटता प्रकर्षाने जाणवते. किशोरीताईंचे माझ्या जीवनातील स्थान सर्वात वरचे असून, पुन्हा जन्म मिळाल्यास मोगुबाईंसह किशोरीताईंकडे शिष्य म्हणून सांगीतिक तालीम घेण्याची इच्छा असल्याचे पंडित द्रविड यांनी व्यक्त केले. आजचे गायक किशोरीताईंच्या गाण्यांची रेकॉर्ड ऐकून त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात; परंतु गाणे हे गुरूमुखीच शिकायचे असते. त्याशिवाय गाण्यात स्वतःची प्रगल्भता आणि आविष्कार उमटत नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. सांगीतिक संवादानंतर पंडित अरुण द्रविड यांची गायन मैफल रंगली. त्यांच्याशी किशोरीताईंचे शिष्य पंडित रघुनंदन पणशीकर यांनी संवाद साधला. पंडित द्रविड यांनी जयपूर घराण्यातील वैशिष्ट्यपूर्ण राग 'रायसा कानडा' सादर करून अल्लादिया खाँसाहेब यांची बंदिश ऐकविली. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात जयपूर-अत्रौली घराण्याच्या जुई धायगुडे-पांडे यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी श्री राग उलगडून दाखवताना परात्पर गुरू गानसरस्वती किशोरी अमोणकर यांची बंदिश सादर केली आणि द्रुत लयीत बलवंतराय भट यांची रचना ऐकविली. त्यानंतर खेमकल्याण राग सादर करताना अल्लादिया खाँसाहेबांची बंदिश सादर करून मध्यलय तीन तालात किशोरीताईंची बंदिश ऐकविली. गुरू पंडित अरुण द्रविड रचित खेमकल्याणमधील तराणा सादर करून त्यांनी मैफलीची सांगता केली. कलाकारांना ऋषिकेश जगताप (तबला), अमेय बिच्चू (संवादिनी), सूर गोखले आणि सचिन शशितळ (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
पीएमपी बसमध्ये अल्पवयीन प्रवासी युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका वाहकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरिफ जलील शेख (वय ३५, रा. चौधरीनगर, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या वाहकाचे नाव आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पीडित युवतीच्या आईने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी शेखविरुद्ध विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती कात्रज आगारातून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होती. आरोपी शेख हा त्याच बसमध्ये वाहक म्हणून कार्यरत होता. प्रवासादरम्यान त्याने युवतीला त्याचा मोबाइल क्रमांक देण्याचा प्रयत्न केला. युवतीने त्याचा प्रयत्न हाणून पाडत नकार दिल्यानंतर, आरोपी शेखने तिला स्पर्श करून विनयभंग केला. या प्रकारानंतर युवतीने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून इतर प्रवाशांनी बस थांबवली आणि वाहक शेखला पकडले. प्रवाशांनी युवतीकडे विचारणा केली असता, वाहक शेखने तिचा विनयभंग केल्याचे समोर आले. त्यानंतर प्रवाशांनी शेखला पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक पोलिस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या आणखी एका घटनेत, एका ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका दहा वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक असून, तो हिंगणे खुर्द परिसरातील एका सोसायटीत राहतो. त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेच्या मुलीला आरोपीने वाईट पद्धतीने स्पर्श केला होता. मुलीने ही बाब आपल्या आईला सांगितल्यानंतर, आईने तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक माधुरी काजळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अनैतिक संबंधातून महिलेचा गळा आवळून खून:नवीन कात्रज बोगद्याजवळ घटना, आरोपीला अटक
मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा परिसरात एका महिलेचा अनैतिक संबंधातून गळा आवळून खून करण्यात आला. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. मनीषा खम्म दमाई (वय २५, रा. नऱ्हे) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, प्रकाश अर्जुन तिखात्री (वय ३०, रा. हिंजवडी, मूळ रा. नेपाळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत किशन भरत परिहार (वय ३५, रा. नऱ्हे, मूळ रा. नेपाळ) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी किशन परिहार यांची मनीषा दमाई ही बहीण होती. मनीषा आणि आरोपी प्रकाश यांच्यात अनैतिक संबंध होते. दोघेही मूळचे नेपाळचे असून, पुण्यात रखवालदार म्हणून काम करत होते. मनीषा आणि प्रकाश दोघेही विवाहित असून त्यांना मुले आहेत. प्रकाशने हे अनैतिक संबंध पुढे सुरू ठेवण्यास नकार दिला होता. तेव्हापासून मनीषा आणि प्रकाश यांच्यात वाद सुरू झाले होते. मनीषा त्याला संबंध सुरू ठेवण्यासाठी आग्रह करत होती, मात्र प्रकाशने नकार दिला होता. मनीषाच्या त्रासामुळे चिडलेल्या प्रकाशने तिला नऱ्हे परिसरात भेटायला बोलावले. गोड बोलून त्याने मनीषाला मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळील एका हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या दाट झाडीत नेले. तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. प्रकाशने दोरीने तिचा गळा आवळून खून केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. मनीषा बेपत्ता झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, दाट झाडीत एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक आयुक्त राहुल आवारे यांनी घटनास्थळी भेट दिली. आंबेगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले आणि सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी यांनी तातडीने तपास सुरू केला. मृतदेहाची ओळख पटवून ती मनीषा दमाई असल्याची खात्री करण्यात आली. तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी प्रकाशला ताब्यात घेण्यात आले. प्रेमसंबंध तोडल्याने मनीषाचा दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपी प्रकाशने पोलिसांना दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पाकिस्तानच्या निवृत्त लष्करप्रमुखांचे निधन
कराची : वृत्तसंस्था पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे शनिवारी वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फेब्रुवारी महिन्यात घरातील बाथरूममध्ये घसरल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या निधनानंतर पाकिस्तानी […] The post पाकिस्तानच्या निवृत्त लष्करप्रमुखांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावतीत माणुसकीला काळिमा:18 वर्षीय तरुणीवर पाच जणांचा सामूहिक अत्याचार, जिल्ह्यात संतापाची लाट
अमरावती जिल्ह्यातील भानखेडा रोडवरील जंगल परिसरात एका 18 वर्षीय तरुणीवर पाच नराधमांच्या टोळीने सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत दुचाकीने जात असताना या टोळीने त्यांना अडवून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, या नराधमांनी पीडितेच्या मित्राकडील 120 रुपयेही जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि त्यानंतर तरुणीवर बळजबरीने अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तत्परता दाखवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाचही संशयित आरोपींना तातडीने ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे अमरावती परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अत्याचाराच्या या घटनेनंतर पीडित तरुणीची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्वरित गुन्हा दाखल केला आणि विशेष शोधमोहीम राबवून पाचही संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, पोलिस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि दोषींना कठोर शासन करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
भोंदू खरातवर कारवाईस विलंब;अमृता फडणवीस यांचे रोखठोक मत
मुंबई : प्रतिनिधी भोंदू अशोक खरात प्रकरणात यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती. असे झाले असते तर ब-याच गोष्टी टाळता आल्या असत्या. अनेक स्त्रियांचे जीवन वाचले असते, असे रोखठोक मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्याला आज नाशिक येथील एका […] The post भोंदू खरातवर कारवाईस विलंब;अमृता फडणवीस यांचे रोखठोक मत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; पिकअप उलटून २ ठार, २३ जण गंभीर जखमी
बुलडाणा : प्रतिनिधी बुलडाण्यात भीषण अपघात झाला. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या पिकअपने जाणा-या बागवान कुटुंबावर काळाने झडप घातली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर २३ जण गंभीर जखमी झाले. मेहकरजवळ नांद्रा फाट्यावर ही घटना घडली. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर […] The post देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; पिकअप उलटून २ ठार, २३ जण गंभीर जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

31 C