SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

29    C
...

लातूरचा आधारवड कोसळला! माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन:‘लातूर पॅटर्न’चे शिल्पकार हरपले; शिक्षणविश्वात शोककळा

लातूरमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाची छाप सोडणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे सर्वेसर्वा आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. गोपाळराव पाटील (आप्पा) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने लातूरसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करत त्यांच्या कार्याची आठवण काढली. लातूरमधील त्यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. डॉ. गोपाळराव पाटील हे मूळचे बालरोगतज्ज्ञ होते. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करताना अनेक रुग्णांना आधार दिला. विशेषतः ग्रामीण भागातील गरीब रुग्णांसाठी ते ‘देवदूत’ ठरले होते. उपचार करताना केवळ व्यवसायिक दृष्टीकोन न ठेवता समाजसेवेची भावना जपणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. वैद्यकीय सेवेसोबतच त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही सक्रिय भूमिका बजावली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा महत्त्वाचा आधार आहे, याची जाणीव ठेवून त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे काम उभे केले. शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी राजर्षी शाहू महाविद्यालयाला राज्यातच नव्हे, तर देशभरात एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच लातूरच्या ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा जागतिक स्तरावर झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये आणि गुणवत्तेच्या बाबतीत मागे राहू नये, यासाठी त्यांनी आयुष्यभर झटले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यांच्या निधनामुळे लातूरच्या शैक्षणिक चळवळीला मोठा धक्का बसला आहे. डॉ. गोपाळराव पाटील यांच्या जाण्याने एक मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या. लातूरच्या शैक्षणिक क्रांतीचा महामेरू हरपला - शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री लातूर येथील शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे संस्थापक, बालरोगतज्ज्ञ आणि माजी खासदार आदरणीय डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने केवळ लातूर जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. डॉ. गोपाळराव पाटील यांनी वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून जनसेवा करतानाच, शिक्षणाचे महत्त्व ओळखून लातूरमध्ये शिवछत्रपती शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या मार्गदर्शनाखालील राजर्षी शाहू महाविद्यालयाने 'लातूर पॅटर्न'च्या माध्यमातून राज्याला आणि देशाला अनेक गुणवंत विद्यार्थी दिले. लातूरची शैक्षणिक ओळख राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राज्यसभेचे सदस्य म्हणून काम करताना त्यांनी वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार आणि रेल्वे यांसारख्या महत्त्वपूर्ण समित्यांवर आपल्या अभ्यासू वृत्तीचा ठसा उमटवला. एक मृदूभाषी, संयमी आणि विकासाची दृष्टी असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनामुळे आपण एका मार्गदर्शकाला मुकलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवारास मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! विनम्र अभिवादन!

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 10:05 am

बारामतीत सांगता सभेची रणधुमाळी:देवेंद्र फडणवीस येणार, शरद पवारांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह; सुनेत्रा पवार यांनी सांगितले कारण

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून आज महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ भव्य सांगता सभा पार पडणार आहे. या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असल्याने संपूर्ण बारामतीत भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आजची सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सभेपूर्वी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी सकाळी सभास्थळाची पाहणी केली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दादांच्या आठवणी बारामतीच्या प्रत्येक कोपऱ्यात आहेत आणि लोकांच्या भावनांमधून त्या स्पष्टपणे जाणवतात. आजच्या सभेत सर्व प्रमुख नेते सहभागी होणार असून पवार कुटुंबातील अनेक सदस्यही उपस्थित राहतील, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, शरद पवार यांच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता व्यक्त करत त्यांनी सांगितले की, त्यांची प्रकृती सध्या ठीक नसल्याने त्यांचा अजून कोणताही संदेश मिळालेला नाही. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, रामदास आठवले, उदय सामंत आणि खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती अपेक्षित आहे. त्यामुळे या सभेला केवळ स्थानिकच नव्हे, तर राज्यभरातून राजकीय लक्ष लागले आहे. सभास्थळी अजित पवार यांच्या आठवणी जागवणारे फोटो आणि फलक लावण्यात आले असून, ते पाहून कार्यकर्ते भावूक होत असल्याचे चित्र आहे. बारामतीतील ही पोटनिवडणूक अजित पवार यांच्या निधनामुळे जाहीर झाली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या रिक्त जागेसाठी ही निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार मैदानात असून काँग्रेसने सुरुवातीला आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, नंतर त्यांनी माघार घेतली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उमेदवारी दाखल केली नाही. तरीही सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 22 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात असला, तरी मताधिक्य किती मिळते, यावर सर्वांचे लक्ष आहे. आतापर्यंत अजित पवार यांनी बारामतीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यामुळे तोच रेकॉर्ड मोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याबाबत बोलताना पार्थ पवार यांनी मतदारांना मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, विजय निश्चित असला तरी मताधिक्य वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सभेला विशेष महत्त्व एकूणच, बारामतीतील आजची सांगता सभा ही केवळ प्रचाराचा शेवट नसून भावनिक आणि राजकीय शक्तीप्रदर्शनाचा मोठा मंच ठरणार आहे. दादांच्या आठवणी, नेत्यांची उपस्थिती आणि मताधिक्याचा मुद्दा या सर्व गोष्टींमुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता या सभेनंतर मतदानाच्या दिवशी मतदार काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 9:51 am

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट:मनीषा माने-मुसळेचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला;आता उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणातील आरोपी मनीषा माने-मुसळे हिला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने तिचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला आहे. जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी सुनावणीदरम्यान हा महत्त्वाचा निर्णय दिला. या निकालामुळे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या प्रकरणात नवे वळण आले असून आता पुढील लढाई उच्च न्यायालयात लढण्याची तयारी सुरू झाली आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल 2025 रोजी रात्री स्वतःवर गोळी झाडून टोकाचे पाऊल उचलले होते. त्याआधी त्यांनी एक चिट्ठी लिहून ठेवली होती. या चिट्ठीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या रुग्णालयात कार्यरत असलेल्या मनीषा माने-मुसळे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपीने आपण निरपराध असल्याचा दावा करत न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. मनीषा माने-मुसळे हिने या गुन्ह्यात आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगत न्यायालयाकडे दिलासा मागितला होता. मात्र, सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेल्या पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने हा अर्ज फेटाळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिच्यावर चालणारी कायदेशीर प्रक्रिया कायम राहणार आहे. या निर्णयाविरोधात आता उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला असून तिचे वकील अ‍ॅड. प्रशांत नवगिरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येचा घटनाक्रमही या प्रकरणात महत्त्वाचा ठरतो. 18 एप्रिलच्या रात्री ते आपल्या रुग्णालयात रुग्णांची तपासणी करून घरी परतले होते. सुमारे 8.30 वाजता त्यांच्या बेडरूममधील बाथरूममधून गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर पुन्हा एकदा आवाज आल्याने कुटुंबीयांनी धाव घेतली असता ते गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापूरसह राज्यात अत्यंत नामांकित न्युरोफिजिशियन म्हणून ओळखले जात होते. वयाच्या 69 व्या वर्षीपर्यंत त्यांनी स्वतः उभारलेल्या ‘एस.पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस’ या अत्याधुनिक रुग्णालयातून हजारो रुग्णांना उपचार दिले होते. त्यांनी दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून शिक्षण पूर्ण करून नंतर डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि एमडी पदवी घेतली. लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून एमआरसीपी ही पदवीही त्यांनी संपादन केली होती. देश-विदेशात त्यांनी संशोधन सादर केले असून त्यांच्या कार्याचा मोठा ठसा वैद्यकीय क्षेत्रावर उमटला आहे. कायदेशीर लढाई तीव्र होण्याची चिन्हे या संपूर्ण प्रकरणामुळे सोलापूरमध्ये मोठी चर्चा सुरू असून न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील सुनावणीत काय घडते, तसेच उच्च न्यायालयात कोणता निर्णय येतो, यावर या प्रकरणाचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र आरोपीला दिलासा न मिळाल्याने कायदेशीर लढाई आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 9:41 am

डॉ. गोपाळराव पाटील काळाच्या पडद्याआड; शैक्षणिक व राजकीय क्षेत्रावर शोककळा

लातूर: लातूरच्या शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे सर्वेसर्वा आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. गोपाळराव पाटील (आप्पा) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे लातूरसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. डॉ. गोपाळराव पाटील हे व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ होते. लातूरसारख्या भागात त्यांनी आरोग्य सेवेचा मोठा पाया रचला. केवळ डॉक्टर म्हणूनच नव्हे, तर ‘गोरगरिबांचा […] The post डॉ. गोपाळराव पाटील काळाच्या पडद्याआड; शैक्षणिक व राजकीय क्षेत्रावर शोककळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Apr 2026 9:35 am

तीन वाक्यांत बदललं समीकरण:एक फोन कारणीभूत ठरल्याचे जाहीर सभेत सांगितले; राहुरी पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय घडामोडींचा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विरोधात कडवे आव्हान उभे करू शकणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अचानक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. या निर्णयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोन कारणीभूत ठरल्याचे त्यांनी स्वतः जाहीर सभेत सांगितले. त्यामुळे राहुरीतील राजकीय समीकरणे एकदम बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे. राहुरी येथे झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, केरळ दौऱ्यावर असताना त्यांनी प्राजक्त तनपुरे यांना फोन करून निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली होती. शिवाजीराव कर्डिले यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या निधनानंतर होणाऱ्या या पोटनिवडणुकीत महाराष्ट्राच्या परंपरेनुसार निर्णय घ्यावा, असे त्यांनी तनपुरेंना सांगितले. फडणवीसांच्या या विनंतीनंतर अवघ्या एका मिनिटात तनपुरेंनी माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी त्यांनी सभेतच तनपुरेंचे आभार मानले. दरम्यान, या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा काही दिवसांपासून रंगली होती. तनपुरे यांनी कार्यकर्त्यांशी सतत संवाद साधत या निर्णयावर विचार सुरू ठेवला होता. मात्र, त्यांनी अद्याप भाजपमध्ये जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. तरीही त्यांच्या माघारीमुळे राहुरीतील राजकारणात त्यांच्या भूमिकेचीच अधिक चर्चा सुरू आहे. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय कर्डिले यांच्याबाबतही मोठी आश्वासने दिली. त्यांनी सांगितले की, शिवाजीराव कर्डिले यांच्यापेक्षा दीडपट प्रेम अक्षयवर केले जाईल. त्यांच्याकडून राहिलेली सर्व कामे पूर्ण केली जातील. तसेच राहुरी एमआयडीसीला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रयत्न केले जातील. कृषी विद्यापीठाच्या अतिरिक्त जमिनीपैकी सुमारे एक हजार एकर जमीन औद्योगिक विकासासाठी वापरण्याचा विचार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे स्थानिक विकासाला गती मिळेल, असा दावा त्यांनी केला. याशिवाय, फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठीही अनेक घोषणा केल्या. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी कर्जमाफी लागू केली जाईल, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जाईल आणि भविष्यात मोफत वीज देण्याचे काम सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत ती योजना बंद होणार नाही, असे ठामपणे सांगितले. महिलांनी या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. नवे समीकरण शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची आठवण करताना फडणवीस भावुक झाले. त्यांनी सांगितले की, कर्डिले हे अत्यंत धोरणी आणि जनतेसाठी काम करणारे नेते होते. त्यांनी अनेक कठीण परिस्थितीतही काम सुरू ठेवले. त्यांच्या अपूर्ण कामांना पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी म्हटले. आता या सर्व घडामोडींनंतर राहुरी पोटनिवडणुकीत कोणते नवे समीकरण तयार होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 9:28 am

संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा:पंढरपुरातून पांडुरंगाच्या पादुका येणार, कोथळी येथील मंदिरात 4 ते 14 मे दरम्यान आयोजन‎

जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र कोथळी येथील समाधिस्थळी आदिशक्ती संत मुक्ताई यांचा ७२९ वा अंतर्धान समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. यानिमित्त ४ ते १४ मे २०२६ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होतील. वैशाख कृष्ण तृतीयेपासून सुरू होणारा हा सोहळा वैशाख कृष्ण द्वादशीपर्यंत चालेल. या सोहळ्यासाठी पंढरपूर येथून प्रत्यक्ष पांडुरंगाच्या पादुकांचे आगमन होणार आहे. सुमारे ७२९ वर्षांपूर्वी विजांच्या कडकडाटात आदिशक्ती मुक्ताबाई अंतर्धान घेत स्व-स्वरूपात लीन झाल्याची धार्मिक परंपरा सांगितली जाते. त्यावेळी सर्व संत नामदेव महाराज, संत निवृत्तीनाथ तसेच समकालीन संत उपस्थित असल्याचे मानले जाते. याच पवित्र स्थळी मुख्य अंतर्धान सोहळा १२ मे २०२६ रोजी साजरा होईल. त्यासाठी पंढरपूर येथून संत नामदेव महाराज व भगवान पांडुरंगाच्या पादुका पालखी, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराज पादुका पालखी, सासवड येथून संत सोपानकाका पादुका सोहळा, कौंडण्यपूर येथून माता रुख्मिणी पादुका सोहळ्यांचे आगमन होईल. आळंदी व देहू येथील संत संस्थानांचे प्रतिनिधी, संत-महंतांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त होईल. या निमित्त वै. पंढरीनाथ महाराज मानकर यांच्या प्रेरणेने आणि वै. प्रल्हाद महाराज सुळेकर यांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या धार्मिक कार्यक्रमांचे व्यासपीठ नेतृत्व संदीप महाराज खामणीकर करतील. सोहळ्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे, व्यवस्थापक उद्धव जुनारे यांनी केले आहे. १२ मे रोजी सायंकाळी ग्राम प्रदक्षिणा, दिंडी सोहळा १२ मे रोजी सकाळी पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री पांडुरंग-रुख्मिणी तसेच संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांचे जुने मंदिरात आगमन होईल. सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत केशवदास नामदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली समाधी सोहळा, पुष्पवृष्टी (गुलाल) कीर्तन व आरती होईल. सायंकाळी ६ ते ७ नगरप्रदक्षिणा दिंडी सोहळा होणार आहे, असे आयोजकांनी सांगितले. १३ मे रोजी पांडुरंग पालखी मिरवणूक निघणार १३ मे रोजी एकादशीनिमित्त सकाळी ७ ते १० वाजेदरम्यान जुने मुक्ताई मंदिर ते नवीन मंदिर मार्गावर श्री पांडुरंग पालखी सोहळा मिरवणूक काढण्यात येईल. त्यात परिसरातील वारकरी, टाळकरी व भजनी मंडळे सहभागी होतील. तसेच पारायणासाठी येणाऱ्या भाविकांनी ३ मे रोजी सायंकाळपर्यंत आवश्यक साहित्यांसह उपस्थित राहावे. याशिवाय आषाढी वारीसाठी मुक्ताई पालखी सोहळ्याचे २४ जूनला प्रस्थान होईल.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 9:22 am

कोथळी उपकेंद्रात रोहित्राचा ‎स्फोट; मुक्ताईनगर अंधारात‎:रात्री 8.55 वाजेची घटना, युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या तालुक्यातील कोथळी येथील १३२/३३ केव्ही उपकेंद्रात सोमवारी रात्री सुमारे ८.५५ वाजेच्या सुमारास पोटेन्शिअल ट्रान्सफॉर्मरमध्ये उष्णतेमुळे अचानक स्फोट झाला. या घटनेमुळे मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात वीजपुरवठा तत्काळ खंडित झाला. सर्वत्र अंधार पसरला. घटनेनंतर उपकेंद्रातील ऑपरेटर व संबंधित अभियंत्यांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. सुदैवाने स्फोटाची तीव्रता असूनही कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली. स्फोटानंतर पर्यायी व्यवस्था उभारून शहरातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले. काही भागांत वीजपुरवठा सुरू करण्यात यश आले; मात्र वाढत्या लोडमुळे पुन्हा पुन्हा वीजपुरवठा खंडित होत होता. यामुळे आधीच उकाड्याने त्रस्त नागरिकांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, तालुक्यातील विविध भागांतील वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी तांत्रिक पथकाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. लवकरात लवकर स्थिती पूर्ववत होईल, असे वीज विभागाकडून सांगण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 8:47 am

प्रभू श्रीरामांचे विचार रुजण्यासाठी तरुणपणीच राम कथा ऐकावी:डॉ. कुमार विश्वास यांचे युवकांना आवाहन, रामकथेला नगरकरांचा प्रतिसाद‎

राम कथा प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे. रामाकडे तारुण्य, धन, प्रभुत्व व संपत्ती आहे. परंतु त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे मर्यादा, संकल्प, प्रतिभा व विनम्रता होती. प्रभू श्रीरामांचे कार्य व विचार तरुणाईमध्ये रुजण्यासाठी राम कथा तरुणपणीच ऐकली पाहिजे. तसेच जीवन धर्म समजण्यासाठी युवा पिढीला राम शिकवले पाहिजेत. धर्म रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांनी व्यक्त केला. माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त येथील काका ट्रस्ट व जगताप परिवाराच्यावतीने डॉ. कुमार विश्वास यांच्या 'अपने अपने राम' या राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेचे प्रथम पुष्प गुंफताना डॉ. विश्वास यांनी राम कथा कशी प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे याचे दाखले देत सविस्तर विवेचन केले. या कथा सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे, आमदार सत्यजित तांबे, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, पोपटराव पवार, उपमहापौर अॅड. धनंजय जाधव आदी उपस्थित होते. डॉ. कुमार विश्वास यांचे नगरवासियांच्यावतीने स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी पार्वतीबाई जगताप, डॉ. वंदना फाटके, डॉ. शशिकांत फाटके, सचिन जगताप, आमदार संग्राम जगताप, सुवर्णा जगताप, शितल जगताप, परमेश्वरी व आराध्य जगताप आदी उपस्थित होते. डॉ. विश्वास म्हणाले, राम कथा प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे. रामाकडे तारुण्य, धन, प्रभुत्व व संपत्ती आहे. परंतु त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे मर्यादा, संकल्प, प्रतिभा व विनम्रता होती. प्रभू श्रीरामांचे कार्य व विचार तरुणाईमध्ये रुजण्यासाठी राम कथा तरुणपणीच ऐकली पाहिजे. तसेच जीवन धर्म समजण्यासाठी युवा पिढीला राम शिकवले पाहिजेत. पाचशे वर्षानंतर अयोध्येत प्रभू रामाचे मंदीर स्थापन झाले आहे. हे काम सरकारने नाही तर सामान्यांच्या भावनेने व मदतीने झाले आहे. अशाच पद्धतीने मथुरा व काशीतही मंदिरे उभी राहतील असा विश्वास व्यक्त करून धर्म रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 8:41 am

अंगावर तेल, डोईवर धगधगते निखारे; कौठवाडीत घुमला हुई..हुई..'चा नाद:बिरोबा यात्रेत 58 भक्तांचा अग्निपरीक्षा'' देणारा नवस‎

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दुर्गम कौठवाडीत रविवारी आदिम संस्कृतीचा अलौकिक सोहळा पार पडला. बिरोबा देवाच्या यात्रेत ५८ भाविकांनी डोक्यावर धगधगते 'पेटते कठे' (घागरी) घेऊन, 'हुई..हुई..' च्या लयीत मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. उकळते तेल अंगावर ओघळत असतानाही, देवाच्या अचाट श्रद्धेपोटी एकाही भक्ताला साधी इजाही झाली नाही, हे या यात्रेचे विशेष आकर्षण ठरले. दरवर्षी ही यात्रा अक्षय्य तृतीयेनंतरच्या पहिल्या रविवारी भरते. मात्र, यंदा अक्षय्य तृतीया आणि रविवार एकाच दिवशी (१९ एप्रिल) आल्याने यात्रेचा उत्साह द्विगुणित झाला होता. रात्रीच्या किर्र अंधारात जेव्हा हे पेटते कठे बाहेर पडले, तेव्हा संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळून निघाला होता. साकीरवाडी आणि कौठवाडीच्या ग्रामस्थांनी या उत्सवासाठी जय्यत तयारी केली होती. डोक्यावर पेटते कठे घेऊन त्यात वारंवार खाद्यतेल ओतून व ते अंगावरून खाली शरिरावर ओघळून संपूर्णतः तेलकट झालेले भक्तांचे उघडेबंब शरीर व डोक्यावर नवसाचे धगधगते कठे हा प्रकार चमत्कारिक होता. भाविकांनी पेटते कठे डोक्यावर घेऊन बिरोबा मंदिराला प्रदक्षिणा घालून नवसपूर्ती केली. ही थरारक परंपरा पाहण्यासाठी केवळ राज्यभरातूनच नव्हे, तर परदेशातूनही पर्यटक कौठवाडीत दाखल झाले होते. हा अलौकिक क्षण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला. आधुनिक युगातही आदिवासी समाज आपली संस्कृती आणि निसर्ग दैवतांवरील श्रद्धा जपून आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही यात्रा. हिंदू महादेव कोळी समाजातील भाविक पुणे, ठाणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातून येथे दाखल झाले होते. कठ्याची जत्रा' म्हणून ओळखला जाणारा हा सोहळा म्हणजे मानवी इच्छाशक्ती आणि श्रद्धेचा अद्भुत संगम ठरला. कौठवाडीचे माजी सरपंच सुरेश भांगरे, दत्तात्रय भोईर, वसंत भांगरे, दत्तात्रय भांगरे, निवृत्ती भांगरे, नितीन धराडे, मधुकर कोंडार, किसन भांगरे, भाऊराव भांगरे, सावळेराम भांगरे, देवराम भांगरे, बाळू घोडे आदींसह शेकडो भाविकांनी रविवारी बिरोबाचा जयघोष करीत रात्र जागवली. बिरोबाच्या पूजेचा मान पारंपरिक पद्धतीने भोईर घराण्याकडे होता. भाविकांकडून रात्रभर सुरू होता बिरोबाचा जयघोष यात्रेत सर्वप्रथम मंदिरासमोरील दीपमाळ दीप प्रज्वलन करून सजविण्यात येते. मंदिर व परिसरातून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. यात्रेत प्रथम मान असलेली बिरोबाची मानाची काठी मिरवणूक काढून नाचवण्यात आली. देवाचे नाव घेत घुमणारे वारे निघाले. प्रथम मानाचा वारा (कठाधारी) मंदिरात प्रवेश करता झाला. त्यापाठोपाठ इतर वारे मंदिरात सोडले. नवसाचे ५८ कठे प्रदक्षिणा घालण्यास सज्ज झाले. यात्रा रात्रभर चालली. पारंपरिक वाद्यसंगीतावर वाजतगाजत ग्रामदैवत श्री बिरोबा मंदिरा भोवती कठे डोक्यावर घेऊन ठराविक ताल धरून हुई हुई हुई च्या लयीत नाचत नाचत प्रदक्षिणा घालून नवस फेडले. मंदिर गाभाऱ्यापासून सुरू झालेली मिरवणूक पुन्हा बिरोबा मंदिरासमोरच आली. मंदिरात घंटानाद करण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 8:41 am

नरखेडमध्ये 417 नागरिकांना मिळाले दाखले:तहसीलदार सचिन मुळीक यांच्या उपस्थितीत विविध दाखल्यांचे वाटप‎

मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे महसूल विभागाच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा'चे आयोजन करण्यात आले होते. नरखेड मंडळातील नागरिकांसाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमात १५ हून अधिक महसुली सेवांचे थेट लाभ देण्यात आले. यामध्ये एकूण ४१७ लाभार्थ्यांनी आपली प्रलंबित कामे पूर्ण करून घेतली. सिद्धेश्वर मंदिरातील श्री सिद्धेश्वर अन्नक्षेत्र मंडळाच्या सभामंडपामध्ये हे शिबिर पार पडले. शिबिराच्या सुरुवातीला तहसीलदार सचिन मुळीक व जिल्हा परिषद सदस्य लखन शिंदे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारात नेण्याच्या उद्देशाने या शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. या प्रसंगी तहसीलदार सचिन मुळीक, जि.प. सदस्य लखन शिंदे यांच्यासह राजकुमार पाटील, विनोद पाटील, गुरु तागडे व इतर सहकारी उपस्थित होते. अनेक दिवसांपासून प्रलंबित दाखले मिळाल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शिबिराचा अनेक गरजूंना लाभ झाला. तहसील कार्यालय, सेतूमध्ये फेऱ्या मारण्याऐवजी गावातच दाखले मिळाल्याने नागरिकांनी विविध दाखले काढून घेतले. यावेळी लाभार्थी उपस्थित होते. एकाच ठिकाणी तालुक्यातील गरजवंतांना मिळाले विविध दाखले या शिबिरामध्ये दिवसभरातविविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ (७५) आणि ८-अ उताऱ्यांचे (५२) वाटप. उत्पन्नाचे दाखले (८८), फेरफार वाटप (४८) आणि प्रलंबित नोंदी निर्गत (१९). पीएम किसान माहिती (६८), संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना प्रकरणे (२२). शिधापत्रिका दुरुस्ती/नाव वाढवणे-कमी करणे (१५), जन्म दाखला चौकशी (५), बिनशेती अर्ज स्वीकृती (२) आणि ऍग्री स्टॅक (२३). इतके दाखले वाटप केले. प्रशासकीय यंत्रणेचे 'मिशन समाधान' हे शिबीर यशस्वी करण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष कष्ट घेतले. यामध्ये मंडळ अधिकारी किसन दळवे, ग्रामपंचायत अधिकारी तात्यासाहेब नाईकनवरे, पुरवठा शाखेचे मितारे, संजय गांधी शाखेच्या नवले, तलाठी विलास मोटे यांच्यासह महसूलचे कर्मचारी उपस्थित होते. नरखेडमध्ये समाधान शिबिरात दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी लाभार्थी.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 8:37 am

हद्दवाढ भागात अंधार; अभियंत्यांना दिला कंदील:उपाय न केल्यास आंदाेलन; वंचितचा इशारा‎

मनपा हद्दवाढ भागात विद्युत पथदिवे नसल्याने नागरिक व वंचित बहुजन आघाडीने सोमवारी अनोख्या पद्धतीने निषेध करत अभियंत्यांना कंदील भेट दिला. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचितचे गटनेते नीलेश देव यांनी दिला. महापालिका हद्दवाढ भागात मूलभूत सुविधांना नागरिकांनी नेहमीच उपस्थिती लावली आहे. या भागात रस्ते, पाणी, स्वच्छता, खुले भूखंडांचा विकास न होणे यावर नागरिक संताप व्यक्त करतात. दरम्यान आता पथदिव्यांचा मुद्दा ऐरणीवर आहे. न्यू तापडीया नगर परिसरातील सोयी-सुविधा निधी अंतर्गत ९ मे २०१८ रोजी मंजूर झालेला ठराव सात वर्षांनंतरही पूर्णपणे अंमलात न आल्याने प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांचा संयम सुटत आहे. चोपडे ले-आऊट ते आपातापा रोड ते खरप परिसरात उभारण्यात आलेल्या शेकडो विद्युत पोलवर स्ट्रीट लाईट न बसवल्यामुळे परिसर अक्षरशः अंधारात ढकलला गेला आहे. सर्व निष्क्रियतेच्या विरोधात सोमवारी नागरिकांनी विद्युत विभागावर कंदील आंदोलन करत प्रशासनाचा निषेध उर्वरित पान ४ विधानसभेचा अकोला पूर्व मतदारसंघ हा २०१४ पासून भाजपच्या ताब्यात आहे. न्यू तापडीया नगर व पुढे अन्य नगरांचा अकोला पूर्व मतदारसंघात समावेश आहे. मनपा निवडणुकीत उबाठाच्या सहापैकी पाच नगरसेवक व वंचितचे पाचही नगरसेवकांचा प्रभाग अकोला पूर्वमध्ये येतो. मनपामध्ये सत्ता स्थापनेतही उबाठा, वंचित, काँग्रेस, राकांसोबत होती. त्यामुळे वंचितसह अन्य विरोधी पक्ष अकोला पूर्वमधील सुविधा, समस्यांवरून भाजपला राजकीय कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. गत नऊ वर्षांपासून न्यू तापडीया नगरातील रेल्वे उड्डाणपूल रखडला आहे. यावरूनही वंचित व उबाठाने आंदोलने केली. वंचितकडून रस्त्यावर, शासनाकडे, रेल्वे विभागाकडेही पाठपुरावा करण्यात येत आहे. आता पथदिव्यावरूनही वंचितने आंदोलन छेडण्याचे संकेत दिले आहेत. भाजपला राजकीय कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 8:32 am

पाणीटंचाई निवारणार्थ 90 गावांतील विंधन विहिरींची करणार विशेष दुरुस्ती:जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता; पाणीपुरवठा होणार अधिक सुरळीत‎

जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विंधन विहीर (बोअरवेल) दुरुस्ती व देखभालबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीच्या कामांना गती देण्यात येणार आहे. यामुळे गावांमध्ये नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित होणार आहे. पाणीटंचाई निवारणार्थ ९० गावांतील विंधन विहिरी दुरुस्तीसाठी २८ लाख ८० हजार रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आले आहेत. दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. पाण्याची मागणीही वाढत आहे. उन्हाळ्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. काही ठिकाणी २-३ कि.मी.पर्यंत पायपीट करून पाणी आणावे लागते. अनेक ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी विकत घ्यावे लागते. मजुरीसाठी फिरावे की पाण्यासाठी भटकंती करावी, असा प्रश्न ग्रामस्थांना पडतो. काही वेळा ग्रामस्थांकडून संबंधित सरकारी यंत्रणांच्या कार्यालयांवर मोर्चेही काढण्यात येतात. दरम्यान, आता विंधन विहीर दुरुस्तीस मंजुरी दिली आहे.विंधन विहीर दुरुस्तीनंतर गावांमध्ये पाण्याची उपलब्धता वाढणार आहे. विशेषतः उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल. विहिरींची नियमित दुरुस्ती झाल्याने पाण्याचादाब व गुणवत्ता सुधारेल. जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये पाणी टंचाईचा मुद्दा गाजतो. पाणी टंचाई असलेल्या गावांचा अनेकदा आराखड्यात समावेश नसतो. त्यामुळे सभांमध्ये पदाधिकारी, सदस्य अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत त्या गावांमध्ये उपाय योजना करण्याची मागणी करताना. पदाधिकारीही आदेश देतात. मात्र जि.प.चे अधिकारी वरिष्ठांनी घालून दिलेल्या निकषांच्या आधार घेत सदस्यांकडून सुचवण्यात येणाऱ्या उपाय योजना करण्यास असमर्थता दर्शवतात. तसेच गतवर्षी अपेक्षित पाऊस ६९३ मि.मी. असताना प्रत्यक्षात ७३२ मि.मी. पावसाची नोंद झाली. यापूर्वी जादा पर्जन्यमान, वाढलेल्या भूजल पातळीचा दाखला देत काही ठिकाणी उपाय योजना नाकारण्यात आल्या होत्या. एकूणच जि.प.च्या निवडणुका झालेल्या नसल्याने सध्या प्रशासकीय राजवट असल्याने मान्यता मिळालेल्या उपाय योजनांची विहित मुदतीत व प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कोण पाठपुरावा करेल, असा प्रश्न आहे. अकोला बार्शीटाकळी मूर्तिजापूर पातूर अकोट तेल्हारा बाळापूर विविध कामे हाती घेतली जाणार पाणी टंचाई निवारणार्थ कामे हाती घेतली जाणार असून, त्यासाठी स्पष्ट अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. या योजनेत विंधन विहिरींची दुरुस्ती करताना पाइप बदलणे, पंप दुरुस्ती, बदल, गाळ काढणे (फ्लशिंग), पाण्याचा प्रवाह सुधारणा यासारखी कामे प्राधान्याने केली जातील. उपाययोजना गतिमान करण्याचे यंत्रणांसमोर आव्हान कृती आराखडाअसा ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. एप्रिल ते जून दरम्यान अडीचशे गावांसाठी २९९ उपाययोजनांचा समावेश आहे. टंचाई आराखड्यात जानेवारी ते मार्च, तसेच एप्रिल ते जून दरम्यान सर्व कामे मिळून २६२ गावांसाठी ३१४ विविध उपाययोजना व त्यासाठी ४ कोटी २७ लक्ष ४० हजार रुपयांच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 8:32 am

60 फूट खोल विहिरीत पडलेल्या गोमातेला जीवदान:सुखरूप बाहेर काढण्यात यश, वारसा संस्थेने घेतला पुढाकार, प्राणीप्रेमींतून केले अभिनंदन‎

येथून जवळच असलेल्या दापोरी गावात ६० फूट खोल असलेल्या कोरड्या विहिरीत एक गाय पडली होती. मात्र ‘वारसा’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून तिला जीवदान दिले. वारसा रेस्क्यू टिमच्या सदस्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या गाईला कोणत्याही प्रकारची इजा होऊ न देता सुखरूप बाहेर काढले. या यशस्वी मोहिमेबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणाऱ्या वारसा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाष व्यवहारे हे नेहमी अशा मदतीसाठी तत्पर असतात. गाय विहिरीत पडल्याची माहिती मिळताच ते आपल्या रेस्क्यू किटसह घटनास्थळी दाखल झाले. विहीर अतिशय लहान असल्यामुळे वरून आतमध्ये काहीही दिसत नव्हते. दरम्यान टॉर्च, बॅटरीचा वापर करून आधी खात्री करून घ्यावी लागली. सध्या या गायीला मोर्शी येथील गोरक्षणमध्ये चारापाण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. विशेष म्हणजे साठ फूट खोल विहिरीत पडूनही या गोमातेला कोणत्याही प्रकारचा मार लागला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कार्यासाठी गावातील जीवन होले, निलेश खोडकर, अमोल धानोरकर, बाबूभाऊ अंधारे, सुनील वानखडे, गजानन दाणे, प्रफुल फलके, अक्षय कडू, विजय करडे, स्वप्नील ढोमणे, ज्ञानेश्वर गेडाम, वृषभ कडू, गोपाल अंधारे, प्रफुल राऊत, अंकुश कोल्हे, गोपी बडोरे, भूषण चौधरी, हरिश कोल्हे, ज्ञानेश्वर डाखोरे, सागर पोटपिटे, यश गोळे, प्रणव वानखडे, विनीत नांदूरकर, नितीन चिखले, हर्षल गलफट यांनी परिश्रम घेतले. वारसा संस्थेच्या रेस्क्यू टिमपैकी एका कार्यकर्त्याला त्यांनी विहिरीत उतरवले. त्यानंतर इतर सहकाऱ्यांनी मदत करून आतमध्ये पूरक साहित्य सोडले. गाईला व्यवस्थित दोराच्या साह्याने कोणत्याही प्रकारची इजा न होऊ देता बांधण्यात आले. नंतर तिला जेसीबी व गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. बाहेर काढल्यानंतर तिला कोणत्याही प्रकारची इजा किंवा मार लागला की नाही, याचीही खात्री करण्यात आली. दरम्यान गाय सुखरूप असल्याचे पाहून सर्वांनीच या मोहिमेबद्दल आनंद व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 8:20 am

875 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण‎:श्रीमती केशरवाई लाहोटी महाविद्यालयात आठवा पदवीदान समारंभ‎

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीशी संलग्न श्री गणेशदास राठी छात्रालय समितीद्वारे संचालित श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आठवा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ १८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता स्वर्गीय शंकरलाल राठी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. स्थानिक महाविद्यालयातील एकूण ८७५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. याचप्रमाणे महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रातून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आपले शोधकार्य यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचे अध्यक्ष वसंतकुमार मालपानी उपस्थित होते. मुख्य अतिथी म्हणून समितीचे सचिव डॉ. गोविंद लाहोटी उपस्थित होते. तसेच, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यकारी मंडळाचे सदस्य दम्मानी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार भांगडिया यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षीय भाषणात मालपानी यांनी परिश्रमाचे महत्त्व विषद केले. कठोर कष्टाशिवाय यश मिळवता येत नाही, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्य अतिथी डॉ. गोविंदजी लाहोटी यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. विशेष अतिथी दम्मानी यांनीही विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. मानव्यविद्या शाखेचे डॉ. रवींद्र कुमार शिरसाट यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांच्या नावांचे वाचन केले. वाणिज्य शाखेचे डॉ. कांतेश्वर ढोबळे यांनीही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांच्या नावांचे वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. जागृती व्यास यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. तीर्थराज राय यांनी केले. मुख्य अतिथी डॉ. अविनाश असनारे यांनी आपल्या मार्गदर्शनात यावर भर दिला की, विद्यार्थ्यांनी पदवीसोबतच कौशल्य विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. पदवी हा जीवनाचा पहिला टप्पा आहे. त्यानंतरच खऱ्या प्रवासाला सुरुवात होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, चिकाटी व मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 8:20 am

टरबूज पिकाचे नुकसान; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न:लेखी आश्वासनानंतरच शेतकरी झाडावरून खाली उतरला, अधिकाऱ्यांकडून तोडगा काढण्याचे पत्र‎

अंजनगाव तालुक्यातील खोडगाव येथील शेतकरी अतुल खारोडे यांनी वीज वितरण कंपनीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांचे विशेषत: टरबुजाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्यांनी वीज वितरण कंपनीच्या आवारातील लिंबाच्या झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, खारोडे यांनी आपल्या तीन एकर शेतात टरबूज पिकाची लागवड केली. मात्र, रात्री साडेदहा ते सकाळी साडेतीन या वेळेत होणारा वीजपुरवठा अनेक दिवसांपासून खंडित होत असल्याने संपूर्ण पीक वाया गेले. या आर्थिक नुकसानीमुळे हताश झालेल्या खारोडे यांनी भावनिक होत आपली व्यथा मांडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार गजानन लवटेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना बोलावून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आदेश दिले. यानंतर वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता वैष्णव जाधव यांनी शेतकऱ्याला लेखी आश्वासन देत वेळेनुसार नियमित वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे मान्य केले. या आश्वासनानंतर अतुल खारोडे यांनी आपला आंदोलनाचा निर्णय मागे घेत ते लिंबाच्या झाडावरून खाली उतरले. यावेळी अंजनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक ठाणेदार सागर भास्कर, शिवसेना शहर प्रमुख राजू अकोटकर, माजी नगरसेवक शंकर मालठाणे, जिल्हा उपप्रमुख महेंद्र दिपटे, विकास येवले तसेच सरपंच योगेश नेमाडे, उपसरपंच शुभम वाघ आणि परिसरातील अनेक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर शेतकऱ्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलल्यानंतर महावितरणची यंत्रणा अगदी दक्ष झाली आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनीकडून यापुढे वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले असून तसे लेखी पत्रसुद्धा अधिकाऱ्यांनी यावेळी दिले आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 8:18 am

अंजनगाव सुर्जी शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा:संतप्त ग्राहकांचा गॅस एजन्सीवर गोंधळ‎

शहरातील देशमुख गॅस एजन्सीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने सोमवार २० रोजी ग्राहकांच्या संयमाचा बांध सुटला. गॅस मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेकडो ग्राहकांनी एजन्सीवर गर्दी करत गोंधळ घातला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता खा. बळवंत वानखडे यांनी तातडीने एजन्सीला भेट देऊन ग्राहकांशी संवाद साधला आणि या समस्येवर प्रभावी तोडगा काढला. देशमुख गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरचा साठा मर्यादित असल्याने अनेक दिवसांपासून नागरिक चकरा मारत होते. वारंवार विनंती करूनही गॅस मिळत नसल्याने सोमवारी सकाळी ग्राहकांनी आक्रमक पवित्रा घेतला. संतापलेल्या नागरिकांनी एजन्सीला जाब विचारण्यास सुरुवात केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सुनील गावंडे (सभापती, कृ.उ.बा.स. दर्यापूर), प्रदीप देशमुख (शहर अध्यक्ष, काँग्रेस कमिटी अंजनगाव सुर्जी), विकास येवले (संचालक, कृ.उ.बा.स. अंजनगाव सुर्जी), सुयोग खाडे (नगरसेवक, न.प. अंजनगाव सुर्जी), कैलाश सिरसाठ यांच्यासह अंजनगाव सुर्जी शहर व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदारांची मध्यस्थी, आक्रमक भूमिका या घटनेची माहिती मिळताच खा. बळवंत वानखडे यांनी थेट गॅस एजन्सी गाठली. यावेळी त्यांनी रांगेत उभ्या असलेल्या महिला आणि पुरुषांच्या व्यथा ऐकून घेतल्या. ग्राहकांचा रोष रास्त असल्याचे पाहून खासदारांनी घटनास्थळावरूनच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. सामान्य नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहूनही हक्काचा गॅस मिळत नसेल, तर हे प्रशासन आणि कंपनीचे अपयश आहे. अंजनगाव सुर्जी शहरातील गॅस पुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करा, अशा कडक शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना ताकीद दिली.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 8:17 am

ऑनलाइन क्रिकेट सट्ट्यावर धाड; यवतमाळ-पुणे कनेक्शन:अमरावतीत तिघे ताब्यात; 5.60 लाखांचा मुद्देमाल जप्त‎

शहराला लागून असलेल्या राजुरा येथे एका घरात सुरु असलेल्या ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर आज, सोमवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड घातली. या धाडीत चालक-मालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाइल, लॅपटॉप, रजिस्टर व इतर साहित्य असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदर घटनास्थळ हे फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत आहे. राजुरा येथील एका घरामध्ये महेश सुरेश पाटकर हा काही जणांसह आयपीएलमधील गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या संघात सुरू असलेल्या सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळाली होती. त्याआधारे गुन्हे शाखेच्या पथकान धाड टाकली. यावेळी तेथे तीन जण मोबाइल व लॅपटॉपचा वापर करून सदर सामन्यावर खायवाडी व लगवाडी (सट्ट्याची घेवाण-देवाण) करीत होते. या घटनेचे कनेक्शन यवतमाळ, पुण्यासोबतही जुळले आहे. प्रारंभी मोबाइल ॲपद्वारे व्यवहार करून नंतर तो रजिस्टरवर उतरवून हारजीतचा खेळ सुरु होता. पोलिसांनी माहिती विचारली असता संबंधितांनी त्यांची ओळख महेश सुरेश पाटकर (३४, रा. अंबा कॉलनी, अमरावती), अभिजीत अरुण पेटकर (३६, रा. आमनेर, वरूड) व सागर रामकृष्ण निंबर्ते (३०, रा. सावता मैदान, बडनेरा) अशी दिली. त्यांच्याजवळील लॅपटॉप व मोबाइलची तपासणी केल्यावर त्यात सट्ट्याचा व्यवहार तसेच खायवाडी व लगवाडीबाबतच्या रेकॉर्डिंग दिसून आल्या. बेकायदेशीरपणे बनविलेले बेटिंग ॲपसुद्धा आढळून आले. आरोपींकडून ९ मोबाइल, २ लॅपटॉप, रजिस्टर व अन्य साहित्य असा ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने, दीपक सुंदरकर, सुनील लासुरकर, जहीर शेख, सचिन बहाळे, अतुल संभे, सूरज चव्हाण, राजीक रायलीवाले, योगेश पवार यांनी केली. क्रिकेट सट्ट्याची उतारी यवतमाळात, पुण्यातही क्रिकेट सट्ट्यासाठीची आयडी कोणाची, याबाबत पोलिसांनी शोध घेतला असता आरोपींनी सदरची आयडी ही रितेश जोशी (रा. यवतमाळ) याच्याकडून घेतल्याचे व क्रिकेट सट्ट्याची उतारी ही पुणे येथील गणेश उर्फ परेश मोहन भूत उर्फ अग्रवाल यांना देत असल्याचे चौकशीत समोर आले. त्यानुसार रितेश जोशी व गणेश उर्फ परेश मोहन भूत या दोघांचा शोध सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 8:16 am

कितीही बिकट परिस्थिती असू द्या; 40% शक्ती आपल्या हातात असते:डॉ. सचिन परब, सगळ्यात जास्त ताकद ‘ओम’ शब्दात आहे‎

ओम शब्दात खूप मोठी ताकद आहे. या शब्दात भरभरुन आनंद जोडला गेला आहे. त्यामुळे कितीही बिकट परिस्थिती असली तरी चाळीस टक्के शक्ती ही नेहमी आपल्या हातातच असते, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारीज् ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात मुंबईचे डॉ. सचिन परब यांनी केले. प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या स्थानिक युनीटतर्फे एक विशेष कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी डॉ. सचिन परब बोलत होते. ते म्हणाले, आपल्या मनगटात असलेल्या शक्तीच्या आधारावर आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करून विजय प्राप्त करू शकतो. भारत हा प्राथमिक व माध्यमिक शाळेत तयार होतो. त्यासाठी शिक्षक हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या मते तुम्ही दुसऱ्यांना प्रसन्न कराल तर तुम्हीसुद्धा प्रसन्न रहाल एकमेकांना समजून घ्या व भावनांवर नियंत्रण ठेवा. सलग तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाचे आयोजन गजानन महाराज मंदिर परिसरात करण्यात आले होते. कार्यक्रमाला जिल्हा संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी सीता दीदी, युवा उद्योजक नवीनकुमार पेठे, नंदू नानोटकर, सुनील पकडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत, डॉ. मुंदडा, नंदकिशोर चिखले, डॉ. श्याम राठी, डॉ. योगेश पोके, अंगनानी, स्नेहा पोके, वसतीगृहाच्या गृहपाल सानिका मंचावर उपस्थित होत्या. डॉ. परब पुढे म्हणाले की सध्या जागतिक स्तरावर युद्धजन्य स्थिती असल्याने अशा तणावपूर्ण वातावरणात राज योगाचे मेडिटेशन हे खूप उपयोगी पडणारे आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांचा दुपट्टा, फोटो फ्रेम व प्रसाद देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मोर्शी ब्रह्माकुमारीज सेंटरच्या संचालिका पारी दीदी यांनी केले. तर आभार डॉ. स्वप्नील सोनोने यांनी मानले.या कार्यक्रमाला डॉ. दीपक ढोले, प्रदीप खोडसकर, जयकुमार गट्टानी, श्रीराव यासह मोर्शी शहरातील राजकीय मंडळी, पत्रकार, व्यवसायिक, महिला भगिनी, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जया दीदी, पिंकी दीदी, रूपाली दीदी, वसंत कुंभारे, संजय गांगडे, शरणजीत भाई,कृ ष्णा भाई, शेखर भाई इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 8:15 am

300 किमीच्या तपश्चर्येनंतर झेंड्यांचे स्वगृही आगमन:श्रीसंत अवधूत महाराज देवस्थान, झेंडा जिर्णोध्दार पथयात्रा सोहळ्याचा भक्तिमय वातावरणात समारोप

तालुक्यातील रुक्मिणीचे माहेरघर तसेच विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कौंडण्यपुर येथे श्री अवधूत महाराजांच्या झेंडे जीर्णोद्धाराच्या रथयात्रेचा समारोप नुकताच पार पडला. भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. या पथयात्रेची सुरूवात १० तारखेला सकाळी श्रीसंत अवधूत महाराज चातूर्पती देवस्थान कौंडण्यपुर येथून झाली होती. महाराष्ट्राच्या मातीत अनेक थोर संत जन्माला आलीत, ज्यांनी आपल्या वाणी, लेखणी आणि विचारांतून संपूर्ण विश्वाला शांती, समता, बंधुता, प्रेम आणि भक्तीचा मार्ग शिकवला. याच संत परंपरेतील एक अग्रणी नाव म्हणजे संत अवधूत महाराज. त्यांनी रचलेल्या ओवी या भविष्याचा वेध घेणाऱ्या आहेत, आणि त्यामुळेच त्या आजच्या काळाला प्रासंगिक आहेत. अवधूत महाराजांचे अनुयायी हे महाराष्ट्रात सर्वदूर लाखोंच्या संख्येने पसरले आहेत. त्यामुळेच दिवसेंदिवस अवधुताच हे प्रस्थ वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भजन पूजनाने झालेला हा पथयात्रेचा प्रवास कौडण्यपुर ते राहू (मेळघाट) असा होता. राहू हे मेळघाटमधील अतीदुर्गम भागात पण निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले ठिकाण आहे. त्या जंगलातूनच अवधूत महाराजांचे झेंडे आणायचे होते. अती खडतर मार्ग, त्यातही उंच माथ्यावरून हे खूप वजनदार झेंडे घेऊन येणे खरोखरचं दिव्य होते, पण अवधूत भक्तांमध्ये जणू देवच संचारला होता. अशक्य वाटणार कार्य त्यांनी कसलीही तमा न बाळगता पूर्ण केले आणि भजन पूजनाच्या गजरात आणि ‘कृष्ण महाराज धनी अवधुत नाम’ असा घोषा करित ४ विशालकाय झेंडे आपल्या खांद्यावर उचलून डोंगरावरून खाली आणले. पुढे या झेंड्यांची विधीवत पूजा करुन त्यांना मोठ्या ट्रकमध्ये टाकून परतीचा प्रवास सुरू केला. या प्रवासात प्रत्येक गावात करपूजा करणाऱ्यांचे भरभरून स्वागत झाले. हजारोंची गर्दी रस्त्यावर दुतर्फा या झेंड्यांचे दर्शन घेण्यासाठी जमत होती. अमरावतीमध्ये राजीवजी ठाकूर यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले. पुढे तिवसा येथील पंचवटी चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यानंतर शेंदुर्जणा बाजार, वाठोडा खुर्द शेंदूर्जणा माहोरा आणि नंतर कौडण्यपुर असा प्रवास करत ही जीर्णोध्दार पथ यात्रा चतूर्पती देवस्थान येथे दाखल झाली. झेंड्याची विधीवत पूजा करून या झेंड्यांना मंदिर परिसरात ठेवण्यात आले आहे आता जवळपास २ महिने या झेंड्यांवर प्रक्रिया करून १२ जूनला त्यांचा जीर्णोध्दार केला जाणार आहे. या पथयात्रेचे संपूर्ण नियोजन संस्थानचे सचिव आणि तिवसा पं. स.चे माजी सभापती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संघटक विलास माहूरे यांनी केले. मेळघाट येथील वन विभागाच्या परवानगीपासून ते पथ यात्रेत डॉ मनवरे यांच्या देखरेखी खाली संस्थेची अँब्युलन्स सज्ज करेपर्यंतची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. याशिवाय संस्थानचेअध्यक्ष रामदासजी निवल, उपाध्यक्ष राजणभाऊ खारकर, कोषाध्यक्ष वासुदेव चोपकर, महासचिव शिशुपाल इखार, संचालक मुकुंदराव चाफले, लाहानुजी वानखेडे, वसंतराव लोखंडे, प्रमोद इंगोले, नामदेव बेलगे, अवधूत शिरपुरे, प्रवीण खारकर, हरिभाऊ खारकर, अंकुश धुमंखेडे, किशोर माटे, देवराव माहूरे आदींनी या धार्मिक कार्याला हातभार लावला. भूगोलासोबत इतिहास जपणारे देवस्थान महाराष्ट्र हे संत परंपरा लाभलेले एक वैभवशाली राज्य म्हणून ओळखले जाते. अनेक थोर संत मंडळी महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली, ज्यांनी आपल्या राज्याला भक्ती परंपरेचा इतिहास दिला. असे म्हटले जाते की इतर राज्यांना फक्त भूगोल आहे, पण महाराष्ट्राला भूगोलासोबतच इतिहासही आहे. कौंडण्यपूर येथील अवधूत देवस्थान अशा भूगोल, इतिहासाचे उत्तम उदाहरण आहे. कार्यक्रमात टवलारे यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनच्या व व्हिडिओच्या माध्यमातून ग्राहकांच्या तक्रारी कशा प्रकारे नोंदवाव्यात, त्यावर प्रभावीपणे कार्य कसे करावे आणि तक्रारींचे निराकरण कशा पद्धतीने करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बँक, हॉस्पिटल व विविध योजनांमध्ये ग्राहकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही त्यांनी मार्गदर्शन केले.त्यांनी यावेळी ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्याची घोषणा केली यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हेल्पलाइनच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 8:14 am

आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप:जिल्ह्यातील 30 हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग‎

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी २१ एप्रिलपासून राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. या संपात अमरावती जिल्ह्यातील सुमारे ३० हजार कामगार, कर्मचारी सहभागी होणार असल्याने बहुतेक कार्यालये ओस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुपारी १२ नंतर हे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करतील. आज दुपारी या संदर्भात सरकारी-निमसरकारी-शिक ्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक डी. एस. पवार यांनी माध्यमांना ही माहिती दिली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपासून निवडक पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असून मागण्या मान्य होईस्तोवर हा लढा सुरु राहणार आहे. पत्रकार परिषदेला इतर पदाधिकारी भास्कर रिठे, अनिल मानकर, विजय सावरकर, डी. व्ही. देशमुख, एस. डब्ल्यू शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. जि.प. कर्मचाऱ्यांचा सहभाग नाही या संपात जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग नाही. जिल्हा परिषदेत जि.प. लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना आणि जि.प. कर्मचारी संघटना अशा दोन स्वतंत्र संघटना आहेत. परंतु गेल्या काही आंदोलनांपासून मध्यवर्ती संघटना आणि जि.प. कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे इतर कार्यालयातील कामगार-कर्मचारी संपात सहभागी होत असताना जिल्हा परिषदेचे कामकाज मात्र सुरळीत सुरु राहणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 8:13 am

‘सेटिंग'च्या आरोपाने सभागृह पेटले; 300 कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी:सर्वपक्षीय स्वच्छता अभ्यास गटावरच ठेवला ठपका‎

स्वच्छता कंत्राटदार कंपनी कोणार्कसोबत झालेल्या वादग्रस्त करारासंदर्भात सर्वपक्षीय स्वच्छता अभ्यास गटाने तयार केलेल्या अहवालाला युवा स्वाभिमान पार्टीचे राजापेठ प्रभागातील नगरसेवक महेश मुलचंदानी यांनी ‘सेटिंग' संबोधल्यानंतर संपूर्ण सभागृह तसेच समितीच्या सर्व सदस्यांनी या बिनबुडाच्या आरोपावर नाराजी व आक्षेप नोंदवला. त्यामुळे सभागृहात चांगलाच गदारोळ निर्माण झाला. यावर सर्वच पक्षातील नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत, असे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. आधी मुलचंदानी यांनी माफी मागावी, अशी मागणी रेटून धरली. त्यानंतर मुलचंदानी यांनी सभागृहाची क्षमा मागितली. तसेच कोणत्याही नगरसेवकाने सभागृहातील समिती, अभ्यास गटावर आरोप करताना दहादा विचार करावा, अशा प्रकारे आरोप करू नये, असे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी सभागृहाला सांगितल्यानंतर या वादावर पडदा पडला. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीसोबत झालेला शहर स्वच्छतेचा करार तसेच कंपनीच्या एकूण कामकाजावरून शहरात उसळलेल्या आगाडोंबानंतर महानगर पालिका सभागृहात सभागृह नेते चेतन गावंडे यांच्या अध्यक्षतेत उर्वरित.पान ४ जीओ टॅगिंग अंतर्गत तत्कालिन आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी केलेली सर्व कामे ही निकृष्ट दर्जाची आहेत. यात पूर्ण भ्रष्टाचार झाला असून कोट्यवधींची कामे ही मॅनेज झाली आहेत. सामान्य जनतेचा पैसा हा तत्कालिन आयुक्तांनी लुटून नेला आहे. सुमारे २०० ते ३०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. वास्तविकत: जीओ टॅगिंग अंतर्गत कामांची अधिसूचना ही जल संपदा विभागासाठी होती. तिचा वापर शहरातील पैसा लुटण्यासाठी करण्यात आला. चौकशी लावावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी महापौरांकडे केली. त्याला नगरसेवक बबलू शेखावत यांनी अनुमोदन दिले. या समितीमध्ये सेवानिवृत्त अभियंता हे कामकाजाचे मुल्यांकन करून चौकशी अहवाल सादर करतील. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. महानगर पालिकेच्या पाच बीओटी तत्त्वावरील व्यापारी संकुलांचा विषय आजच्या आमसभेतही स्थगित ठेवण्यात आला. मनपासह व्यापाऱ्यांचेही नुकसान होऊ नये. यासाठी मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले असून शासनाच्या अधिसुचनेनुसार प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवावा लागेल. अशी माहिती नगरसेवक अॅड. प्रशांत देशपांडे यांनी सभागृहाला दिली. त्यावर विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी शहर विकासाच्या मुद्यावर आपण सारे एक आहोत, असे यावेळी हसून सांगितले. शिक्षण विभाग नगरसेवकांनाही जुमानेना शिक्षण विभागातील कर्मचारी हे व्यसनाधुंद असून त्यांच्याविरोधात कारवाई व्हायला हवी. मला त्यांनी फोनवरून तुला बघून घेऊ अशी थेट धमकी दिल्याचा आरोप नगरसेवक चंदू खेडकर यांनी केला. सोबतच फोनवरील संभाषण त्यांनी महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापतींना ऐकवले. या प्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशा कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक चंदू खेडकर यांनी सभागृहात केली. त्यावर आयुक्त चौकशी करून कारवाई करतील, तुम्हाला न्याय मिळेल, असे महापौरांनी सांगितले. त्यांनी हातातील काही कागद फाडून निषेध नोंदवला. बीओटी तत्त्वावरील व्यापारी संकुलांचा विषय आमसभेतही ठेवला स्थगित

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 8:13 am

वणीमध्ये गॅस वितरणाचा बोजवारा; 70 दिवसानंतरही मिळेना सिलिंडर:कडक उन्हात दोन-दोन‎तास रांगेत उभे राहून रिकाम्या हाताने परतण्याची वेळ‎

शहर व परिसरात गॅस वितरणाच्या विस्कळीत नियोजनामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. नियमानुसार ठराविक कालावधीत सिलिंडर मिळणे अपेक्षित असताना, ६० ते ७० दिवस उलटूनही पुरवठा होत नसल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील नियोजन कोलमडले आहे. ऑनलाईन नोंदणी करूनही उन्हात दोन-दोन तास रांगेत उभे राहून रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. वशिलेबाजी व काळा बाजाराचा आरोप : दिंडोरी-पिंपळगावला २१ दिवसांत सिलिंडर उपलब्ध होत असताना, वणीतच इतका विलंब का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. एजन्सीचे कार्यालय, गोडावून आणि प्रत्यक्ष वितरण केंद्र ही तिन्ही ठिकाणे वेगवेगळ्या भागात असल्याने ग्राहकांची मोठी पळापळ होत आहे. काही ग्राहकांचे मोबाईल क्रमांक अपडेट नसल्याचा गैरफायदा घेत त्यांच्या नावाचे सिलिंडर इतरांनाच दिले जात असल्याचा खळबळजनक आरोप नागरिकांनी केला आहे. ^आमच्याकडे १६ हजार ग्राहक आहेत. पूर्वी साडेआठ हजार सिलिंडरचा पुरवठा होत असे, तो आता ६ हजारांवर आला आहे. पुरवठा कमी असल्याने आम्ही बुकिंगनुसार ‘होम टू होम' वितरण करत आहोत. ‘ज्याचे बुकिंग त्यालाच सिलिंडर’ हे तत्व आम्ही पाळत आहोत. - हेमंत बोथरा, संचालक इंडेन गॅस एजन्सी, वणी १४ एप्रिलपर्यंत बुकिंग असलेल्या ग्राहकांनाच सिलिंडर : वितरणाचे नवीन वेळापत्रक: केवळ १४ एप्रिलपर्यंत बुकिंग असलेल्या ग्राहकांनाच सिलिंडर मिळणार आहे, असा संदेश वणी गॅस एजन्सीच्या वतीने ग्राहकांसाठी जारी करण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 8:10 am

कार्यालयीन फेऱ्यांना आळा; महसूल सेवा गावपातळीवर:अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांचे प्रतिपादन; इगतपुरी तालुक्यातील कावनईत विशेष महसूल शिबिर‎

महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांना गावपातळीवर एकाच ठिकाणी सुलभ व पारदर्शक पद्धतीने देण्यासाठी इगतपुरीसह राज्यातील ३५८ तालुक्यांत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना कार्यालयीन फेऱ्यांपासून दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सांगितले. कावनई येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान’ शिबिरात ते बोलत होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन दत्ता, उपजिल्हाधिकारी रवींद भारदे, तहसीलदार अभिजित बारवकर आदी उपस्थित होते. खारगे म्हणाले, महसूल विभागाचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंध आहे. सातबारा उतारा मोबाईलवर उपलब्ध झाला असून, विविध दाखले डिजिटल पद्धतीने दिले जात आहेत. काही सेवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही उपलब्ध आहेत. त्यामुळे वेळ, श्रम व खर्चाची बचत होत आहे. प्रत्येक तालुक्यात महसूल सेवा, प्रमाणपत्रे, अर्ज निकाली काढणे, शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन दिले जात आहे. शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते सुधारणा, अतिक्रमण नियमितीकरण आणि ‘सर्वांसाठी घरे’ योजनेवरही भर देण्यात येत आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व विभागांनी समन्वयाने गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात, असे निर्देश दिले. पंचायत समिती, कृषी, आरोग्य व इतर विभागांनीही सहभाग घेतला आहे. आमदार खोसकर यांनी सांगितले की, गत दोन महिन्यांपासून तालुक्यात विविध ठिकाणी शिबिरे आयोजित केली जात असून, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रास्ताविकात तहसीलदार अभिजित बारवकर यांनी शिबिर आयोजनामागील भूमिका विशद करून या शिबिरांतर्गत तालुक्यात आतापर्यंत देण्यात आलेल्या लाभाची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांचे लाभ प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले. शिबिरातील स्टॉल्स‌्ना विकास खारगे यांनी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन पारदर्शक महसूल विभागाने तंत्रज्ञानाचा व्यापक वापर सुरू केला आहे. सातबारा उतारा मोबाईलवर उपलब्ध झाला असून विविध दाखले व प्रमाणपत्रे डिजिटल पद्धतीने दिली जात आहेत. काही सेवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनही मिळत आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ, श्रम व खर्चाची मोठी बचत होत असून प्रशासन अधिक पारदर्शक झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 8:06 am

तलवाडा भक्तीचे केंद्र- पंढरीनाथ महाराज पगार:तलवाडा येथे प्रभू श्रीराम, शनेश्वर महाराज मंदिराचे भूमिपूजन उत्साहात‎

वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथे प्रभू श्रीराम व शनेश्वर महाराज मंदिराच्या उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा संत-महंतांच्या पवित्र उपस्थितीत उत्साहात पार पडला. याप्रसंगी धार्मिक वातावरणात मंत्रोच्चार व पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी संत-महंतांनी धर्म, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. मंदिराच्या उभारणीमुळे गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना मिळणार आहे. यावेळी पंढरीनाथ महाराज म्हणाले की, तलवाडा हे गाव भक्तीचे केंद्र असून अन्नदान व ज्ञानदानाची अखंड सेवा देणारे भक्तीचे केंद्र म्हणून ओळखले जात असून येथे धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. महाराज कोणत्याही पगाराच्या अपेक्षेशिवाय निःस्वार्थ भावनेतून समाजसेवा करत आहेत. नियमित अन्नदान व ज्ञानदान यासारखे उपक्रम सुरू असून, गरजूंना अन्नाची मदत तसेच तरुण पिढीला आध्यात्मिक व नैतिक शिक्षण दिले जात आहे. यावेळी मधुसुधन महाराज, पंढरीनाथ महाराज, सारंधर महाराज, सर्वानंदगिरी महाराज, ज्ञानेश्वर महाराज मधाने, चंद्रभान दादा महाराज, पांडुरंग महाराज, रवी महाराज, पुरुषोत्तम महाराज चांगदेव महाराज, भागीनाथ मगर, राजेंद्र मगर, जनार्दन मगर, हरीभाऊ मगर, काशीनाथ मगर, जयराम मगर, भाऊसाहेब मगर, दादाभाऊ मगर, किशोर मगर, रवी मगर यांच्यासह गावकरी संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र मगर यांनी केले. भागीनाथ मगर यांनी प्रास्ताविक केले तर आभार भाऊसाहेब मगर यांनी मानले. उपक्रमामुळे एकात्मता, श्रद्धा आणि संस्कारांची जोपासना उपक्रमामुळे एकात्मता, श्रद्धा आणि संस्कारांची जोपासना होत आहे. गावातील नागरिक श्रद्धेने या कार्यात सहभागी होत असून तलवाडा गावाचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 7:49 am

उपनिरीक्षकपदी बढती झाल्याबद्दल शिरे सायगाव येथील संजय जगताप यांचा सत्कार

गंगापूर तालुक्यातील शिरे सायगाव येथील संजय जगताप यांची पोलिस उपनिरीक्षक पदी बढती झाल्याबद्दल सिरेसायगाव येथे नागरी सत्कार करण्यात आला. जगताप यांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून बढती झाली आहे. सोबतच साडू असलेले सुरेश बालचंद नवले यांचीही पोलिस उपनिरीक्षक पदावर बढती झाल्याबद्दल दोघांचाही सिरेसायाव, गोपाळवाडी व रोटस्थळ येथील ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी दोन्ही मान्यवरांची फटाक्यांच्या आतषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली हनुमान मंदीर परिसरातील कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य संतोष जाधव, लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अनिल चव्हाण, दादासाहेब तायडे, राजेंद्र पोळ, रवींद्र पोळ, पांडुरंग पाटील जगताप, पंचायत समिती सदस्य दादासाहेब जगताप यांची भाषणे झाली. दोन्ही सत्कारमुर्तींनी सत्काराला उत्तर देताना कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनेश पोळ, अप्पासाहेब जगदाळे, सुभाष धोत्रे विनायक चव्हाण, देविदास धोत्रे यांसह असंख्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी बाजार समितीचे संचालक अशोक जगताप, अण्णासाहेब जगताप, योगेश नेमाने, अप्पासाहेब जगताप, अन्वर शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. युवा नेते गणेश जगताप यांनी आभार मानले.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 7:48 am

रिझर्व्ह बँकेकडून पैसे येत नसल्याने जिल्ह्यातील बॅंकांत चलन तुटवडा:गॅस सिलिंडर, पेट्रोलनंतर आता हक्काचे पैसेही मिळेना‎

गॅस सिलिंडर, पेट्रोलनंतर आता जिल्ह्यातील नागरिकांना चलन तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मागील महिन्यापासून रिझर्व्ह बँकेकडून चलन पुरवठा झाला नसल्याने बँकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे मोठ्या व्यावसायिकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. स्टेट बॅँक ऑफ इंडिया ही सिल्लोड तालुक्याची मुख्य बँक असून, या बँकेच्या माध्यमातून इतर राष्ट्रीयीकृत, नागरी, सहकारी बँकांना चलन पुरवठा केला जातो. रिझर्व्ह बँकेकडून मार्च महिन्यात जिल्ह्याला चलन पुरवठा झाला होता. त्यानंतर आतापर्यंत चलन पुरवठा झाला नाही. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सहकारी बँकांमध्ये कॅश नसल्याने नागरिकांनाही कॅश तुटवड्याची झळ सोसावी लागत आहे. पि. मोघे, अग्रणी बँक, जिल्हा बॅँक व्यवस्थापक, छत्रपती संभाजीनगर ऐन सणासुदीच्या काळात बँकांमध्ये चलन तुटवडा निर्माण झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पैसे कोठून आणावेत आणि सण कसा साजरा करावा, अशी चिंता लागली आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक जण वेगवेगळी खरेदी करतात, परंतु ग्रामीण भागातील खातेदारांकडे ऑनलाइन पैसे करण्यासाठी यूपीआय किंवा नेट बँकिंग नसल्याने ते अडचणीत सापडले होते. अक्षय्य तृतीया झाल्यानंतरच लगेचच लग्नसराई सुरु होत आहे. ग्रामीण भागातील व्यवहार हे रोखीने होत असल्याने त्यांना नगदी पैसे हवे असतात. परंतु बँकेतच रोकड उपलब्ध नाही. अद्रक, मका उलाढालीतून तालुक्यात मोठे आर्थिक व्यवहार होतात. बाहेर तालुक्यातील व्यावसायिक, खरेदीदार येथे येतात. या व्यावसायिकांचे पेमेंट देताना स्थानिक विक्रेत्यांना अडचणी निर्माण होत आहेत. बँकांमधून पुरेशी रक्कम हातात पडत नसल्याने व्यावसायिकांना त्यांच्या मालाचे पैसे देणे अवघड जात आहे. मागच्या एक-दोन महिन्यांपासून ही परिस्थिती निर्माण झाली. Q- बँकेत चलन तुटवडा का जाणवत आहे? - रिझर्व्ह बँकेकडून चलन कमी प्रमाणात पाठवले जात आहे. Q - संभाजीनगर जिल्ह्यात एकूण किती बँका आहेत? - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ५१५ बँका आहेत. Q - अजून किती दिवस चलनाचा तुटवडा राहील? -एक- दोन दिवसांत हे चित्र बदलेल. नागरिकांना मागणीप्रमाणे रोकड मिळेल. कडक उन्हात पैशांसाठी भटकंती व्यावसायिकांची अडचण वाढली

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 7:47 am

हायवाच्या धडकेत पैठणचा दुचाकीस्वार जागीच ठार:एमआयडीसी परिसरातील घटना, हायवा ताब्यात‎

पैठण- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील एमआयडीसी परिसरात हायवाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २०) मध्यरात्री घडली. शिवाजी बापूराव पठाडे (४२, रा. नारळा, ता. पैठण) असे मृताचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी पठाडे हे सोमवारी मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच २० एफएफ ०२२६) मुधलवाडी परिसराकडे जात होते. एमआयडीसी परिसरातील अग्निशमन दल कार्यालयाजवळ रस्ता ओलांडत असताना छत्रपती संभाजीनगरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या हायवाने त्यांच्या दुचाकीस समोरून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात पठाडे यांचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीचा चुराडा झाला. अपघातानंतर हायवा चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी पठाडे यांना तत्काळ पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सपोनि ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त हायवा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हेल्मेट वापरा, मृत्यू टळेल दुचाकीवर असताना नेहमी हेल्मेट वापरा. तसेच शक्यतो पूर्ण कपडे आणि शूज घाला. चप्पल किंवा सँडल घालून गाडी चालवणे टाळा, कारण घसरल्यास किंवा अपघात झाल्यास पायाला गंभीर इजा होऊ शकते. या सोबतच दुचाकी चालविण्यापूर्वी टायरमधील हवेचा दाब योग्य आहे की नाही, हे तपासावे. टायर जास्त घासलेले नसावेत.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 7:47 am

खुलताबादमध्ये समस्या निवारण शिबिर; 213 तक्रारींवर कारवाई:आ. प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन सज्ज, नागरिकांचा प्रतिसाद‎

आमदार प्रशांत बंब यांच्या पुढाकारातून तहसील कार्यालयात आयोजित समस्या निवारण शिबिराला सोमवारी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळपासून तहसील कार्यालय परिसरात गर्दी झाली होती. विविध भागांतून नागरिक समस्या मांडण्यासाठी आले होते. शिबिरात रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था, शासकीय योजनांबाबत एकूण २१३ तक्रारी नोंदल्या गेल्या. अनेक तक्रारींवर जागेवरच सुनावणी झाली. तत्काळ निर्णय देण्यात आले. काही तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच निकाली काढल्या. शिबिरात तहसीलदार संतोष गुट्टे यांच्यासह महसूल, पंचायत समिती, आरोग्य, शिक्षण, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. विभागांनी समन्वय साधला. दिवसभर तक्रारींच्या निवारणासाठी काम केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे-पाटील, जि.प. सदस्य प्रतीक्षा कापसे, रेखा चव्हाण, कुणाल दांडगे, सभापती सुनीता खंडागळे, उपसभापती मंदा वाकळे, पं.स. सदस्य दिनेश अंभोरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, जिल्हा सरचिटणीस विकास कापसे, तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ, परसराम बारगळ, योगेश बारगळ, उमेश आवारे उपस्थित होते. समस्या सोडवणे प्रशासनाची जबाबदारी आमदार बंब यांनी नागरिकांच्या समस्या सोडवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगितले. कोणतीही तक्रार प्रलंबित ठेवू नये, असे त्यांनी बजावले. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असा इशारा दिला. पुढेही अशी शिबिरे घेऊन नागरिकांना थेट न्याय देण्याचा प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 7:45 am

डॉ. आंबेडकर सभागृहाचे लोकार्पण:निधी कमी पडू देणार नाही, वडोद बाजारला चव्हाणांचे आश्वासन‎

तालुक्यातील वडोद बाजार येथे रविवारी (दि. १९) सकाळी ९ वाजता मारुती मंदिरासमोर विविध विकासकामांचा शुभारंभ, लोकार्पण झाले. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील कुठल्याही गावातील विकासकामांना निधीची कमतरता होऊ देणार नाही, असे आमदार अनुराधा चव्हाण यांनी सांगितले. त्या उपस्थितांना मार्गदर्शन करत होत्या. कार्यक्रमाला आमदार अनुराधा चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, जि. प. सदस्य गोपाल वाघ, पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे उपस्थित होते. गीरजा नदीवरील संरक्षक भिंतीसह नदीकाठच्या सुरक्षेसाठी बांधलेल्या भिंतीचे उद्घाटन झाले. केंद्रीय जिल्हा परिषद शाळा, वस्ती शाळा येथे एकूण ३ नवीन शाळा खोल्या, अंगणवाडीचे उद्घाटन झाले. जैन समाजासाठी नूतन सभागृह उद््घाटन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे लोकार्पण झाले. आमदार अनुराधा चव्हाण म्हणाल्या, प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी मी कटीबद्ध आहे. कुठल्याही गावाच्या विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही. गावाची शैक्षणिक सोय मजबूत केली जाईल. पायाभूत सुविधा मजबूत केल्या जातील. यावेळी इंदुबाई वाघ, शिलाबाई शिनगारे, स्वाती वायकोस, भगवान कोलते, कडुबा मस्के, राजू तुपे, जनार्दन तुपे, अरुण तुपे, दादाराव तुपे, बाबासाहेब तुपे, भाऊसाहेब साबळे, विजय साबळे, दत्ता मेटे, साहेबराव महाराज मेटे, विष्णू गाडेकर, रामेश्वर पवार उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 7:44 am

आता अंतिम मुदत द्या:गुंठेवारीत 2 लाख घरे नियमितीकरणास 26 वर्षांमध्ये 30 व्यांदा दिली मुदतवाढ

शहरातील गुंठेवारी वसाहतींमधील मालमत्ता नियमित करण्याच्या प्रक्रियेला मनपाच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी (२० एप्रिल) ६ महिने मुदतवाढीचा प्रस्ताव महापौर समीर राजूरकर यांनी मंजूर केला. आता २१ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांना प्रस्ताव सादर करता येतील. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रक्रिया तुकड्या-तुकड्यात सुरूच असल्याने आता प्रशासनाने याला अंतिम मुदत द्यावी, अशी आक्रमक मागणी नगरसेवकांनी केली. याच वेळी ओपन स्पेसची गुंठेवारी आणि बनावट बाँड प्रकरणावरून सभेत प्रशासनाला धारेवर धरण्यात आल्याचा दावा नगरसेवक विजय औताडे यांनी केला. १९९९ मध्ये गुंठेवारीचा कायदा आला. त्यानंतर दर ८-१० महिन्यांनी नियमितीकरणाला मुदतवाढ मिळाली. गरिबांच्या शाळा दलालांच्या घशात घालू नका; सीबीएसई शाळांवरून संताप शहानूरवाडी भाजी मंडई, बस पार्किंगवरून मनपाच्या सर्वसाधारण सभेत घमासान गुंठेवारीचा अंतहीन प्रवास इतर प्रमुख शहरांमध्ये गुंठेवारीची प्रक्रिया ठराविक मुदतीत पूर्ण करण्यावर भर दिला जात असताना संभाजीनगरमध्ये मात्र ही प्रक्रिया दशकभरापासून लांबत चालली आहे. राजकीय दबावापोटी वारंवार मिळणारी मुदतवाढ ही अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जोपर्यंत प्रशासकीय शिस्त आणि तांत्रिक पडताळणी कडक होत नाही तोपर्यंत मनपाच्या तिजोरीऐवजी दलालांचे खिसे भरले जातील हे वास्तव आहे. ‘शक्ती कपूर’ शब्दप्रयोगावरून सभागृह घेतले डोक्यावर सभेत एका व्हायरल व्हिडिओवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. वंचितचे नगरसेवक अफसर खान यांनी एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची तुलना बॉलीवूड अभिनेता शक्ती कपूर यांच्याशी केल्याने एमआयएम नगरसेवक आक्रमक झाले. इम्तियाज यांच्या परवानगीशिवाय शहरात काम होणार नाही, अशा आशयाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ही टीका करण्यात आली होती. यामुळे सभागृहात गदारोळ झाला. महापौरांनी अखेर “असंसदीय’ शब्द कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश दिले, तर नगरसेवकांसाठी “प्रशिक्षण वर्ग’ घेण्याची सूचना उपमहापौर जंजाळ यांनी मांडली. अधिकाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न शहरात २ लाखांपेक्षा जास्त मालमत्ता या गुंठेवारी भागात आहेत. सुमारे ४० टक्के शहर अशाच प्रकारे वसले आहे. किमान ३० ते ४० नगरसेवक या भागाचे नेतृत्व करतात. त्यामुळे हा प्रश्न नगरसेवकांचा जिव्हाळ्याचा राहिला आहे. मनपाला सर्वाधिक उत्पन्न देणारा हा विभाग आहे. २ वर्षांत सुमारे १४० कोटींचे उत्पन्न झाले. ओपन स्पेसची गुंठेवारी ही बिल्डर, जमीन विक्री करणारे व्यावसायिक यांच्याशी सबंधित विषय आहे, त्यामुळे हा विषय कायम चर्चेत असतो. अनुभवी नगरसेवकांनी हीच नस पकडत भूमाफिया आणि प्रशासन या दोघांना ‘लक्ष्य’ केले. औरंगपुरा आता संभाजीपेठ तर सिटी चौक होणार श्रीकृष्ण-सुदामा चौक मनपाने मांडलेल्या प्रस्तावानुसार, गुंठेवारी नियमितीकरणाची विद्यमान मुदत ३० एप्रिल रोजी संपत होती. ती आता १ मे ते २१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. भाजपचे राजगौरव वानखेडे यांनी या प्रक्रियेतून आतापर्यंत जमा झालेल्या महसुलाचा जाब विचारला. नगररचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे यांनी माहिती दिली की, २०२५-२६ या वर्षात ९,७७८ प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यातून पालिकेच्या तिजोरीत ७७ कोटी १३ लाख रुपयांचा महसूल जमा झाल्याचे सांगितले. शहराच्या महत्त्वाच्या असलेल्या औरंगपुरा बाजारपेठेचे नाव बदलून आता संभाजीपेठ करण्याच्या प्रस्तावावर सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. यासोबतच रंगारगल्ली-सिटी चौकाचे नाव श्रीकृष्ण-सुदामा चौक करण्यासह एकूण १५ नामांतराचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, ते अंतिम मंजुरीसाठी शासकीय समितीकडे पाठवले जाणार आहेत. रशीदमामूंचा विरोध, खैरेंची सारवासारव स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी संभाजीपेठ नामांतराचा प्रस्ताव मांडला. यावर उद्धवसेनेचे नगरसेवक रशीदमामू यांनी अनपेक्षित विरोध दर्शवला. “महापुरुषांची नावे गल्लीला देऊन त्यांना लहान करू नका,” अशी भूमिका रशीद मामू यांनी मांडली. राजू वैद्य यांनी “पक्षाची नवीन भूमिका अंगवळणी पडायला वेळ लागेल,” असा टोला मामू यांना लगावला. वाद चिघळत असतानाच उद्धवसेनेचे नगरसेवक सचिन खैरे यांनी मध्यस्थी करत मकरिये यांचे अभिनंदन केले आणि प्रस्तावाला पाठिंबा दिला. एमआयएमच्या अलमास खानम यांनी “केवळ नावांचे राजकारण करण्यापेक्षा शाळा-रुग्णालये उभारा’ असे मत मांडले.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 7:42 am

अहवाल आला, आता खरीप हंगामापूर्वी राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी- फडणवीस:थकीत कर्जदारांना 2 लाख माफी, तर नियमित भरणाऱ्यांना 50 हजारांचा लाभ

राज्यावर यंदा पावसाचे संकट गडद होण्याची चिन्हे आहेत. मे महिन्यातील उष्णतेच्या लाटांनंतर आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ‘एल निनो’चा सर्वाधिक प्रभाव जाणवणार असून सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले असून, पावसाने ओढ दिल्यास उद्भवणाऱ्या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आतापासूनच ‘बॅकअप प्लॅन’ तयार केला आहे. केवळ पावसावर अवलंबून न राहता तंत्रज्ञान आणि स्थानिक नियोजनाच्या जोरावर पाणी आणि चाराटंचाईवर मात करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. मराठवाड्यावर ‘दुष्काळी’ सावट? हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ‘एल निनो’ सक्रिय झाल्यामुळे पावसाळ्यात दीर्घ खंड पडण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फटका मराठवाड्यासारख्या कमी पावसाच्या पट्ट्याला बसू शकतो. शेतकरी असाल तर हे नक्की वाचा प्रश्न : कर्जमाफीसाठी कोण पात्र असेल?उत्तर : ज्यांचे पीक कर्ज ३० जून २०२५ पर्यंत थकीत आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत लाभ मिळेल.प्रश्न : राज्यामध्ये खरिपासाठी बियाण्यांची सध्या स्थिती काय?उत्तर : राज्यात बियाण्यांची टंचाई नाही. गरजेच्या १३९% (२८.०५ लाख क्विंटल) साठा सध्या उपलब्ध आहे.प्रश्न : “एल निनो’ चा धोका कसा टाळणार?उत्तर : यंदा ९२% पावसाचा अंदाज असल्याने कृषी विभागाने हवामान प्रतिरोधक बियाणे आणि बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. प्रामाणिक शेतकऱ्यांना लाभ केवळ कर्जदारांनाच नाही, तर जे शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करत आहेत, अशा प्रामाणिक शेतकऱ्यांचेही सरकारने कौतुक केले आहे. या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. ३० जून २०२६ पूर्वी या सर्व योजनांवर अंतिम अंमलबजावणी केली जाईल, असेही भरणे यांनी स्पष्ट केले. खरीप २०२६ चे नियोजन पेरणी क्षेत्र : १४५.२० लाख हेक्टर.खतपुरवठा : २५.१७ लाख मेट्रिक टन.नुकसान भरपाई : १ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १५,६६१ कोटी रुपये जमा.अवकाळी मदत : मागील आठवड्यातील २.१५ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे ग्रामीण भागात रोष कमी होण्यास मदत राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारा ठरणार आहे. १५ हजार कोटींहून अधिक रकमेचे थेट वितरण आणि आता २ लाखांपर्यंतची कर्जमाफी, यामुळे ग्रामीण भागातील रोष कमी होण्यास मदत होईल. मात्र, ‘एल निनो’ मुळे पावसाची अनियमितता राहिल्यास हे आर्थिक गणित सांभाळण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर असेल. ‘एल निनो’चा धोका ओळखून राज्य सरकार सतर्क कर्जमाफीचा मुद्दा नेहमीच राजकीय पटलावर केंद्रस्थानी असतो, याच मुद्द्याच्या आधारे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची अनेकदा कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरी येथील एका सभेत, कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल आल्याचे स्पष्ट केले. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी कर्जमाफी दिली जाईल, असे जाहीर सोमवारी केले. यानुसार थकीत कर्जदारांना २ लाखांची माफी, तर नियमित भरणाऱ्यांना ५० हजारांचा लाभ देण्यात येईल. फडणवीस म्हणाले, खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रत्यक्षात कर्जमाफी अस्तित्वात आणणार आहोत. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यांनाही मदत केली जाईल. पुढील महिन्यात महाराष्ट्रात १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा व मोफत वीज दिली जाईल. दरम्यान, पुण्यातील खरीप हंगाम बैठकीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये सुमारे १४५.२० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, भात, मका, तूर, उडीद, कापूस व ऊस या प्रमुख पिकांच्या पेरणीचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 7:32 am

नारीशक्ती वंदन अधिनियमा’वरून राज्यातील राजकीय वातावरण तापले:आम्ही चर्चेला तयार; सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदेंनी फडणवीसांचे आव्हान स्वीकारले

“नारीशक्ती वंदन अधिनियमा’वरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांना दिलेल्या चर्चेच्या आव्हानाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “मुख्यमंत्री म्हणतील त्या वेळी आणि त्या ठिकाणी आम्ही चर्चेला तयार आहोत, पण आधी सरकारने आरक्षणाच्या अंमलबजावणीतील टाळाटाळ थांबवावी,” अशा शब्दांत महिला खासदारांनी मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारले आहे. देशाचे तुकडे पाडण्याचा भाजपचा डाव : प्रणिती शिंदे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर घणाघाती आरोप करत पंतप्रधान मोदींनाच चर्चेचे आव्हान दिले. “महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना करून उत्तर आणि दक्षिण भारतात फूट पाडण्याचा भाजपचा डाव होता. पण इंडिया आघाडीने हा डाव उधळून लावला आहे. भाजप खोटारडेपणावर उभा असून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हा सर्व बनाव रचला गेला,’ असे त्या म्हणाल्या. हा तर ‘डिलिमिटेशन’चा डाव: खा. सुप्रिया सुळे “संसदेत महिला आरक्षणाचे बिल एकमताने मंजूर झाले असताना पुन्हा विशेष अधिवेशनाचा घाट का घातला गेला ? हे बिल प्रत्यक्षात महिला आरक्षणाचे नसून मतदारसंघ पुनर्रचनेचे (डिलिमिटेशन) होते. सरकारला खरोखरच महिलांना न्याय द्यायचा असेल, तर ५४३ जागांपैकी ३३ टक्के आरक्षण आजच लागू करा, अशी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी या वेळी बोलताना केली.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 7:29 am

नागपूरला एनजीओ जिहाद:चाैघींची धर्मांतराची तक्रार; अध्यक्षाला अटक, शिक्षण प्रसाराच्या नावाखाली संस्थेची स्थापना करून रियाज काझीचे सुरू होते अनेक गैरप्रकार

नाशिक येथील टीसीएस या कॉर्पोरेट कंपनीतील महिला लैंगिक अत्याचार, धर्मांतराचे प्रकरण धगधगत असतानाच नागपूर येथील मानकापूर भागातील एका एनजीओतील (गैर सरकारी संस्था) जिहादची घटना उघडकीस आली आहे. युनिव्हर्सल मल्टिपर्पज सोसायटी असे या एनजीओचे नाव आहे. या संस्थेचा अध्यक्ष रियाज काझीने महिलांचे लैंगिक शोषण केले. त्यांचा मानसिक छळ केला. त्यांना धमकावले. मुस्लिम धर्माच्या कार्यात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केली. त्याच्याविरोधात चार पीडितांनी पोलिसात तक्रार केल्यावर त्याला अटक झाली. त्याचा मोबाइल जप्त करण्यात आला असून न्यायालयाने त्याची २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. वेबसाइटवर बँक खात्याचा तपशील देऊन गोळा करत होता रक्कम नोकरीवरून काढून जिवे मारण्याचीही धमकी1 रियाज वर्षभरापासून त्यांचा छळ, शोषण करत होता.2 धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती.3 नकार दिल्यास नोकरीवरून काढून जिवे मारण्याची, सर्रास धमकी देत होता.4 नोकरी सोडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या देत होता.5 महिलांना मुस्लिम धर्मीयांनुसार कपडे घालण्यास व त्यांच्या चालीरीती पालन करण्यास भाग पाडत होता. बनावट इन्स्टा खाते काढले होते रियाज त्याच्या संस्थेतील हिंदू तरुणींवर रमजानमध्ये रोजा ठेवणे, नियमित नमाज पठणासाठी दबाब टाकत होता. तो बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून या तरुणींवर नजर ठेवत होता. तरुणींच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना त्रास देत होता. नेटवर्कचा तपास केला जाणार आरोपी रियाजचे धर्मांतराचे नेटवर्क नेमके कसे चालत होते, त्याला इतर काही संस्था मदत करत होत्या का, याचा तपास केला जाणार आहे. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, त्याच्या संस्थेला अमेरिका, बेंगळुरू येथून निधी मिळत होता, असे निदर्शनास आले आहे. दहा वर्षांपासून कारनामे : अमेरिका, बेंगळुरूतून मिळत होता निधी रियाजने त्याच्या संस्थेच्या वेबसाइटवर स्वत:ला एक अनुभवी समाजसेवक म्हटले आहे. एक दशकाहून अधिक काळात मी समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणाऱ्या अनेक प्रकल्पांचे यशस्वी नेतृत्व केले, असे त्याने नमूद केले आहे. याच वेबसाइटवर त्याने संस्थेच्या बँक खात्याचा सविस्तर तपशील दिला आहे.त्यावर तो ‘हम पढे, पढाये हम’ या मोहिमेच्या नावावर रक्कम गोळा करत असावा, असे दिसते.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 7:24 am

नाशिक कॉर्पोरेट जिहाद:निदा खानवर अटकेची टांगती तलवार कायम,अटकपूर्व जामीन अर्जावर 27 राेजी होणार सुनावणी

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात टीसीएस कंपनीतील फरार प्रोग्राम असोसिएट निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी नाशिक रोड न्यायालयात सुनावणी झाली. तिच्या वकिलांनी ती एचआर मॅनेजर नाही, ती तीन महिन्यांची गरोदर असून या प्रकरणात तिचा काही संबंध नाही. मीडियाच्या दबावामुळे तिला गोवण्यात आल्याचा दावा केला. सरकार पक्षाच्या वकिलांनी बाजू मांडण्यासाठी वेळ मागून घेतला. पीडितेचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती ॲड. मिलिंद कुरकुटे यांनी केली. आता २७ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. २३ मार्चपासून फरार निदाला न्यायालयाने अटकेपासून संरक्षण न दिल्याने तिच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. विशेष सरकारी वकील किरण बेंडकुळे म्हणाले की, न्यायालयाने निदा खानला अटकेपासून दिलासा दिलेला नाही. पीडिता आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणांची ओळख करून देणे व भेटीची ठिकाणी ठरवणे असे काम निदा करत होती. भाजप नेत्या नाझिया खान यांनी लेन्सकार्टच्या शोरूम मॅनेजरला झापत कर्मचाऱ्यांना लावला टिळा लेन्सकार्ट कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावर असताना कपाळावर टिळा लावणे, महिलांनी कुंकू, टिकली लावणे किंवा पुरुषांना जानवे परिधान करण्यास मनाई केली. मात्र, हिजाब आणि काळी पगडी घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या नेत्या नाझिया इलाही खान यांनी लेन्सकार्टचा स्टोअर मॅनेजर मोहसीन खानला झापले. आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांना मोहसीन खानला टिळा लावण्यास सांगितले. नंतर त्यांनी स्वत:ही इतर कर्मचाऱ्यांना भगवा टिळा लावला. कॉर्पोरेट जिहादमागे आंतरराष्ट्रीयकट असू शकतो : विजया रहाटकर मुंबई | नाशिकच्या टीसीएसमधील प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय कट असू शकतो, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्या म्हणाल्या, फॅक्ट फाइंडिंग कमिटीद्वारे आयोग कारस्थानाच्या मुळापर्यंत जाणार आहे. त्यासाठी चौकशी समितीला दहा दिवसांची मुदत दिली आहे. भोंदूबाबा खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांनी स्वत:हून चौकशीला सामोरे जाऊन नैतिकता सिद्ध करावी, असेही रहाटकर म्हणाल्या.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 7:22 am

नाशिकला 5 तास विजांचा पाऊस, अर्ध्या तासात 18 काेसळल्या,:मराठवाडा, प. महाराष्ट्रात 21 ते 23 दरम्यान वादळी पावसाचा इशारा

राज्यात निसर्गाचा लपंडाव सुरू आहे. एका बाजूला विदर्भातील काही भागांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला तर दुसरीकडे प. महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी अमरावतीत राज्यातील सर्वाधिक ४३.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील २४ जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. सोमवारी अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावल्याने कमाल तापमानात किंचित घट झाली. सध्या उत्तर ते दक्षिणेत उष्णतेची लाट कायम आहे. यामुळे विदर्भातील जिल्ह्यांना थेट झळा बसत आहेत. विदर्भात २१ तारखेला उष्ण रात्रीची स्थिती निर्माण होऊ शकते. २२ ते २४ एप्रिलदरम्यान तेथील हवामान कोरडे राहून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. रविवारी पहाटे ३ पर्यंत कडाडत होत्या विजा रविवारी रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत आकाशात विजा कडाडत होत्या. चांदशीतील चारमजली इमारतीवरून हे फोटो रात्री १.३० ते २.०० वाजेच्या दरम्यान टिपलेत छायाचित्रकार दिलीप गिते यांनी.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 7:18 am

अमरावतीतील व्हिडिओ कांड:अयानचा मित्र उजेरनेही केला एका मुलीचा छळ, स्वतंत्र गुन्हा, पुन्हा एका पीडितेच्या आईची तक्रार

अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्या कृतीचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अटकेत असलेला अयानचा साथीदार उजेर खान इक्बाल खान हाही एका मुलीचा छळकर्ता असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले आहे. विशेष तपास पथकासमोर रविवारी एका १६ वर्षीय पीडितेच्या आईने तक्रार नोंदवली. दरम्यान, त्या तक्रारीच्या आधारे उजेर खानविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८ आणि लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमाच्या (पॉस्को) सहकलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला. अशा प्रकारे आतापर्यंत या प्रकरणात दोन स्वतंत्र एफआयआर दाखल झाले आहेत. या प्रकरणी पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी ही माहिती दिली. आनंद यांच्या मते उजेर त्या मुलीच्या संपर्कात होता. ही बाब पीडितेच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने ऐकले नाही. त्याने अजूनही त्या मुलीला फोन करून छळणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे त्या मुलीच्या आईने रविवारी तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा मुख्य आरोपी अयान आहे. त्याच्यावर १३ एप्रिललाच गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात त्याची मंगळवारपर्यंत कोठडी घेतली आहे. अयानने आतापर्यंत ८ अल्पवयीन मुलींचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो व्हायरल केले आहेत. अयानविरुद्ध एका १५ वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली आहे. दरम्यानच्या काळात एसआयटीने तिचा जबाब नोंदवला. प्रकरण सक्षम करण्यावर पोलिस यंत्रणेचा भर याबाबत अधिक तपशील सांगण्यास नकार देताना पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी वरिष्ठांचेच तसे निर्देश असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मते या प्रकरणातील काही माहिती गोपनीय राखणे अनिवार्य आहे. परंतु योग्य वेळी संपूर्ण तपशील माध्यमांसमोर आणला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 7:08 am

त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शन घोटाळा:विश्वस्ताच्या खासगी बचत खात्यात 1.13 कोटी जमा, विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, गोटीराम बेहरे यांना तीन दिवसांची कोठडी

त्र्यंबकेश्वर मंदिर व्हीआयपी दर्शन घोटाळ्यात नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. मुख्य संशयित विश्वस्त पुरुषोत्तम कडलग याच्या खासगी बँकेतील बचत खात्यात तब्बल १ कोटी १३ लाखांची रक्कम जमा असल्याचे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले. अवघ्या चार दिवसांत ७१ भाविकांना चोरवाटेने दर्शन घडवल्याचा ठपकाही विश्वस्तावर ठेवण्यात आला. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याकरिता कडलग आणि बेहरे या दोन्ही संशयितांच्या पोलिस कोठडीत २४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. आधीच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. पैशांचा मार्ग शोधणे आवश्यक असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण न्यायाधीश एस. व्ही. लाड यांनी तपासात समोर आलेले आर्थिक व्यवहार आणि रजिस्टरमधील नोंदी यांचा थेट संबंध जोडणे गरजेचे असल्याचे नमूद केले. हा पैसा नक्की कुठून आला आणि कुणाकडे गेला याचा तपास करण्यासाठी कोठडी गरजेची असल्याचा युक्तिवाद मान्य करून पोठडीत वाढ केली. उत्तर दरवाजातून एन्ट्री, रजिस्टरमध्ये नाव; जबाबामध्ये मात्र इन्कारउत्तर दरवाजाच्या नोंदवहीमध्ये ३, ४, ५ आणि ११ एप्रिल २०२६ रोजी ७१ भाविकांची नोंद करण्यात आली आहे. हे सर्व भाविक विश्वस्त कडलग याचे नातेवाईक असल्याचे सांगत मंदिरात सोडण्यात आले. मात्र पोलिसांनी विचारणा केली असता, ‘हे लोक कोण आहेत हे मला माहीत नाही,’ अशी उडवाउडवीची उत्तर दिली.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 7:07 am

कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडितेने साेसला काॅर्पाेरेट जिहाद:आपबिती सांगताना पीडितेला अश्रू अनावर; आयोगाच्या सदस्यांचेही डोळे पाणावले

“मॅम, घरी वडील कॅन्सरने अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यांच्या उपचारांसाठी पैसे हवेत म्हणून मी तो सगळा अपमान आणि नरकयातना मुकाट्याने सोसत राहिले...” हे सांगताना त्या कोवळ्या मुलीला हुंदके अनावर झाले. नाशिकमधील बहुचर्चित ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील पीडित तरुणींची ही भीषण आणि आतड्याला पीळ पाडणारी कहाणी ऐकून समोर बसलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या. रविवारी महिला आयोगाच्या सत्यशोधन समितीने शहरातीलच एका महाविद्यालयात या पीडित मुलींशी तब्बल तीन तास संवाद साधला. ही केवळ एका गुन्ह्याची नोंद नव्हती, तर गरिबी आणि हतबलतेचा निर्दयीपणे गैरफायदा घेणाऱ्या एका विकृत षड््यंत्राची ती काळीकुट्ट कहाणी होती. टीसीएस कॅम्पसमध्ये दीड तास केली सखोल चौकशी पीडितांचा हा आक्रोश ऐकून सुन्न झालेल्या आयोगाच्या विशेष समितीने थेट ‘टीसीएस’ कंपनीच्या कॅम्पसमध्ये धडक दिली. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, माजी पोलिस महासंचालक बी. के. सिन्हा आणि ज्येष्ठ वकील मोनिका अरोरा यांच्या या सत्यशोधन समितीने तिथे तब्बल दीड तास कसून चौकशी केली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले गोपनीय स्टिंग ऑपरेशन आणि एसआयटीप्रमुख संदीप मिटके यांनी केलेल्या तपासाबद्दल आयोगाने समाधान व्यक्त केले. अर्धांगवायूने वडील अंथरुणाला खिळले होते दुसऱ्या एका मुलीचे वडील अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेले आहेत. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी तिच्याच खांद्यावर. घरात कधी अन्नाचा कण नसायचा. अशा वेळी स्वाभिमानापेक्षा पोटाची भूक मोठी ठरली. कॉर्पोरेट क्षेत्रातील काही लांडग्यांनी याचाच लाभ उचलला. नोकरीच्या नावाखाली तिला धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी पाडले गेले. आरोपींच्या मुसक्या आवळणार... या लेकींना छळणाऱ्या मुख्य सूत्रधारांपैकी फरार ‘प्रोग्राम असोसिएट’ निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे, तर शुक्रवारपासून एटीएस आणि पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रझा मेमन आणि शफी शेख यांची कोठडी संपत असल्याने त्यांनाही आज न्यायालयात हजर केले जाईल. आपल्या कुटुंबासाठी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या या लेकींचे अश्रू आता केवळ न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आयोगाच्या कठोर भूमिकेमुळे या नराधमांवर आता मोठी कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वडिलांच्या केमोथेरपीसाठी औषधांची गरज होती एका पीडितेचे वडील कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात मृत्यूशी झुंजत आहेत. वडिलांच्या केमोथेरपीसाठी आणि महागड्या औषधांसाठी पैशांची नितांत गरज होती. केवळ याच कारणामुळे ती मुलगी तिथे होणारा सर्व मानसिक छळ आणि अपमान सहन करत राहिली. कॉर्पोरेट कंपनीतील वरिष्ठांनी होत असलेल्या अत्याचाराची दखल घेतली नाही.

दिव्यमराठी भास्कर 21 Apr 2026 6:54 am

‘मी पळ काढणार नाही किंवा शरणागती पत्करणार नाही’– न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा

न्यायमूर्ती शर्मा यांनी स्पष्ट केले की, एखाद्या राजकारण्याने किंवा पक्षकाराने न्यायाधीशांच्या क्षमतेवर आणि निपक्षपातीपणावर संशय व्यक्त केला, म्हणून न्यायाधीश सुनावणीतून मागे हटत नाहीत. त्यांनी केजरीवालांच्या अर्जाला ‘कॅच-२२’ (Catch-22) परिस्थिती म्हटले, जिथे सुनावणीतून बाजूला होणे म्हणजे आरोपांना स्वीकारण्यासारखे असेल आणि सुनावणी सुरू ठेवणे म्हणजे पक्षपातीपणाचा शिक्का मारण्यासारखे असेल. केजरीवालांचे प्रमुख आरोप आणि न्यायमूर्तींची उत्तरे न्यायमूर्तींनी केजरीवालांच्या […] The post ‘मी पळ काढणार नाही किंवा शरणागती पत्करणार नाही’ – न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Apr 2026 6:19 am

थिरकणारे हात-पाय आता रचनात्मक काम करणार

प्रमोद राऊत धाराशिव : पोटाची खळगी भरण्यासाठी कलाकेंद्रात थिरकणारे पाय आता विसावले आहेत. काही गैरप्रकार घडल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सर्व कलाकेंद्र शासनाने बंद केले आहेत. थिरकरणारे पाय विसावल्यामुळे कलाकेंद्रात काम करणा-या त्या महिलांच्या पोटा-पाण्याचा, रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांना स्वावलंबी बनवणार आहे, असे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार […] The post थिरकणारे हात-पाय आता रचनात्मक काम करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Apr 2026 12:50 am

पेन्शन क्षेत्रात आता विदेशी गुंतवणूकवाढीला मंजुरी?

सरकारच्या हालचाली, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक! नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकार पेन्शन क्षेत्रातील परकीय गुंतवणूक मर्यादा १०० टक्के करण्याच्या विचारात आहे. या संदर्भातील विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आणले जाऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. यामुळे पेन्शन क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढू शकते. केंद्र सरकारने विमा क्षेत्र १०० टक्के विदेशी गुंतवणुकीसाठी खुले केले आहे. त्याचप्रमाणे पेन्शन […] The post पेन्शन क्षेत्रात आता विदेशी गुंतवणूकवाढीला मंजुरी? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Apr 2026 12:47 am

शिंदेसेनेच्या २ गटांत जुंपली

अपघाताने शिवसेनेत : शिंदे, शंभूराज देसाईंवर निशाणा सातारा : प्रतिनिधी मी आणि माझ्या कुटुंबाने भाजपसाठी काम केले आहे. २०१९ साली कोरेगावची जागा शिवसेनेला गेल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला उद्धव ठाकरेंकडे पाठवले आणि अपघाताने आपण शिवसेनेत गेलो, असे वक्तव्य आमदार महेश शिंदे यांनी केले. जिल्ह्यात शिवसैनिक राहिला आहे का असा सवाल करत आपण स्वत:च्या जीवावर निवडून आल्याचा […] The post शिंदेसेनेच्या २ गटांत जुंपली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Apr 2026 12:42 am

४ पराभवानंतर मुंबईचा विजय

अहमदाबाद : सलग ४ पराभवांच्या धक्क्यानंतर सहाव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार विजय मिळविला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२६ च्या ३० व्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने गुजरात टायटन्सचा ९९ धावांनी मोठा पराभव केला. या विजयासह मुंबईने स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. तिलकच्या शतकाच्या जोरावर मुंबईने २० षटकांत १९९ धावांचा डोंगर उभा केला. […] The post ४ पराभवानंतर मुंबईचा विजय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Apr 2026 12:40 am

अवधूत महाराजांचे झेंडे 300 किलोमीटरची यात्रा पूर्ण करून परतले:कौंडण्यपूर येथे झेंडा जीर्णोद्धार पथयात्रेचा भक्तिमय वातावरणात समारोप

तालुक्यातील रुक्मिणीचे माहेरघर आणि विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे श्री अवधूत महाराजांच्या झेंडे जीर्णोद्धाराच्या रथयात्रेचा नुकताच समारोप झाला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते. या पथयात्रेची सुरुवात १० ऑक्टोबर रोजी सकाळी श्रीसंत अवधूत महाराज चातूर्पती देवस्थान कौंडण्यपूर येथून झाली होती. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक अग्रणी नाव म्हणजे संत अवधूत महाराज. त्यांनी आपल्या वाणी, लेखणी आणि विचारांतून शांती, समता, बंधुता, प्रेम आणि भक्तीचा मार्ग शिकवला. त्यांच्या ओव्या भविष्याचा वेध घेणाऱ्या असून त्या आजही प्रासंगिक आहेत. अवधूत महाराजांचे लाखो अनुयायी महाराष्ट्रात सर्वदूर पसरले आहेत. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भजन-पूजनाने सुरू झालेला हा पथयात्रेचा प्रवास कौंडण्यपूर ते राहू (मेळघाट) असा होता. मेळघाटातील अतिदुर्गम आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या राहू येथून अवधूत महाराजांचे झेंडे आणायचे होते. अतिशय खडतर मार्गातून, उंच माथ्यावरून हे वजनदार झेंडे घेऊन येणे हे एक दिव्य कार्य होते. तरीही, अवधूत भक्तांनी कोणतीही तमा न बाळगता हे कार्य पूर्ण केले. त्यांनी भजन-पूजनाच्या गजरात आणि 'कृष्ण महाराज धनी अवधूत नाम' असा जयघोष करत चार विशालकाय झेंडे खांद्यावर उचलून डोंगरावरून खाली आणले. पुढे या झेंड्यांची विधीवत पूजा करून त्यांना मोठ्या ट्रकमध्ये ठेवून परतीचा प्रवास सुरू करण्यात आला. या प्रवासात प्रत्येक गावात करपूजा करणाऱ्यांचे भरभरून स्वागत झाले. हजारो भाविक रस्त्याच्या दुतर्फा या झेंड्यांचे दर्शन घेण्यासाठी जमत होते. अमरावतीमध्ये राजीवजी ठाकूर यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर तिवसा येथील पंचवटी चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. शेंदुर्जणा बाजार, वाठोडा खुर्द, शेंदुर्जणा माहोरा मार्गे ही जीर्णोद्धार पथयात्रा चतूर्पती देवस्थान येथे दाखल झाली. मंदिरात दाखल झाल्यावर झेंड्यांची विधीवत पूजा करण्यात आली आणि त्यांना मंदिर परिसरात ठेवण्यात आले आहे. आता पुढील दोन महिने या झेंड्यांवर प्रक्रिया करून १२ जून रोजी त्यांचा जीर्णोद्धार केला जाणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 11:55 pm

वीजपुरवठा खंडित झाल्याने पीक नुकसान; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न:लेखी आश्वासनानंतर अंजनगावमधील शेतकरी झाडावरून खाली उतरला

अंजनगाव तालुक्यातील खोडगाव येथील शेतकरी अतुल खारोडे यांनी वीजपुरवठा खंडित झाल्याने पिकांचे नुकसान झाल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी वीज वितरण कंपनीच्या आवारातील लिंबाच्या झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ते झाडावरून खाली उतरले. खारोडे यांनी आपल्या तीन एकर शेतात टरबूज पिकाची लागवड केली होती. रात्री साडेदहा ते सकाळी साडेतीन या वेळेत होणारा वीजपुरवठा अनेक दिवसांपासून खंडित होत असल्याने त्यांचे संपूर्ण पीक वाया गेले. या आर्थिक नुकसानीमुळे ते हताश झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार गजानन लवटे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना बोलावून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आदेश दिले. यानंतर, वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता वैष्णव जाधव यांनी शेतकऱ्याला लेखी आश्वासन दिले की, वेळेनुसार नियमित वीजपुरवठा सुरू ठेवला जाईल. या आश्वासनानंतर अतुल खारोडे झाडावरून खाली उतरले. यावेळी अंजनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक ठाणेदार सागर भास्कर, शिवसेना शहर प्रमुख राजू अकोटकर, माजी नगरसेवक शंकर मालठाणे, जिल्हा उपप्रमुख महेंद्र दिपटे, विकास येवले तसेच सरपंच योगेश नेमाडे, उपसरपंच शुभम वाघ आणि परिसरातील अनेक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यापुढे वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले असून, तसे लेखी पत्रही शेतकऱ्याला देण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 11:54 pm

60 फूट खोल विहिरीतून गायीला सुखरूप बाहेर काढले:मोर्शीजवळ 'वारसा' संस्थेच्या प्रयत्नांमुळे मिळाले जीवदान

मोर्शी प्रतिनिधी: मोर्शीजवळील दापोरी गावात ६० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या एका गायीला 'वारसा' संस्थेच्या सदस्यांनी सुखरूप बाहेर काढले. संस्थेच्या तत्परतेमुळे गायीला जीवदान मिळाले असून, या यशस्वी बचाव मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना दापोरी गावात घडली. गाय ६० फूट खोल विहिरीत पडल्याची माहिती मिळताच 'वारसा' संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाष व्यवहारे आपल्या रेस्क्यू किटसह घटनास्थळी पोहोचले. विहिरीची गोलाई कमी असल्याने आणि गाय शरीराने मोठी असल्याने ती खोलवर फसली होती. विहिरीच्या आत काहीही दिसत नसल्याने टॉर्च आणि बॅटरीच्या साहाय्याने आधी खात्री करण्यात आली. त्यानंतर 'वारसा' संस्थेच्या बचाव पथकातील एका कार्यकर्त्याला विहिरीत उतरवण्यात आले. इतर सहकाऱ्यांनी आवश्यक साहित्य खाली सोडले. गायीला दोराच्या साहाय्याने कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे बांधण्यात आले. जेसीबी आणि गावकऱ्यांच्या मदतीने तिला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. बाहेर काढल्यानंतर गायीला कोणतीही दुखापत झाली नसल्याची खात्री करण्यात आली. ६० फूट खोल विहिरीत पडूनही गायीला मार लागला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या या गायीला मोर्शी येथील गोरक्षणमध्ये चारापाण्यासाठी पाठवण्यात आले आहे. या बचावकार्यासाठी जीवन होले, निलेश खोडकर, अमोल धानोरकर, बाबूभाऊ अंधारे, सुनील वानखडे, गजानन दाणे, प्रफुल फलके, अक्षय कडू, विजय करडे, स्वप्नील ढोमणे, ज्ञानेश्वर गेडाम, वृषभ कडू, गोपाल अंधारे, प्रफुल राऊत, अंकुश कोल्हे, गोपी बडोरे, भूषण चौधरी, हरिश कोल्हे, ज्ञानेश्वर डाखोरे, सागर पोटपिटे, यश गोळे, प्रणव वानखडे, विनीत नांदूरकर, नितीन चिखले आणि हर्षल गलफट यांसह अनेक गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 11:53 pm

आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप:जुनी पेन्शन व इतर मागण्यांसाठी ३० हजार कर्मचारी सहभागी

अमरावती | जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवार, २१ एप्रिलपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपात अमरावती जिल्ह्यातील सुमारे ३० हजार कामगार आणि कर्मचारी सहभागी होणार असल्याने जिल्ह्यातील बहुतांश सरकारी कार्यालये ओस पडण्याची शक्यता आहे. या संपाबाबत सरकारी-निमसरकारी-शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक डी. एस. पवार यांनी सोमवारी दुपारी माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की, हा संप बेमुदत असून, संपकरी कर्मचारी सकाळी आपापल्या कार्यालयांसमोर निदर्शने करतील. त्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून निवडक पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतील. मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरू राहील. या संपात आरोग्य, शिक्षण, क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांसह महानगरपालिका, नगरपालिका, महसूल, विमा, आरटीओ तसेच बँकांचे कामगार व कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे जिल्हाभरातून सुमारे ३० हजार कर्मचारी काम बंद ठेवून आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करतील. जुनी पेन्शन योजना लागू करण्याव्यतिरिक्त, चतुर्थश्रेणी व वाहनचालक पदभरतीवरील बंदी उठवावी, सर्व कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात, आठवा वेतन आयोग त्वरित लागू करावा, सर्वांसाठी कॅशलेस विमा योजना लागू करावी, रिक्त पदे त्वरित भरावीत, १०-२०-३० ही आश्वासित प्रगती योजना सर्वांना लागू करावी आणि कर्मचाऱ्यांवरील हल्ले अजामीनपात्र गुन्हा ठरवावे, अशा विविध मागण्या यावेळी मांडल्या जातील. या पत्रकार परिषदेला डी. एस. पवार यांच्यासह भास्कर रिठे, अनिल मानकर, विजय सावरकर, डी. व्ही. देशमुख, एस. डब्ल्यू शिर्के आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या संपात जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग नाही. जिल्हा परिषदेत जि.प. लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना आणि जि.प. कर्मचारी संघटना अशा दोन स्वतंत्र संघटना आहेत. गेल्या काही आंदोलनांपासून मध्यवर्ती संघटना आणि जि.प. कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे इतर कार्यालयांमधील कामगार-कर्मचारी संपात सहभागी होत असताना जिल्हा परिषदेचे कामकाज मात्र सुरळीत सुरू राहणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 11:52 pm

अमरावतीत ऑनलाइन क्रिकेट सट्ट्यावर धाड, तिघे ताब्यात:५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त; यवतमाळ-पुण्यातही कनेक्शन उघड

अमरावती शहरालगतच्या राजुरा येथे सुरू असलेल्या ऑनलाइन क्रिकेट सट्ट्यावर गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी चालक-मालकासह तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा येथील एका घरात आयपीएलमधील गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यावर ऑनलाइन सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने धाड टाकली. धाडीदरम्यान, तीन व्यक्ती मोबाइल आणि लॅपटॉपचा वापर करून 'खायवाडी' आणि 'लगवाडी' (सट्ट्याची घेवाण-देवाण) करत असल्याचे आढळून आले. या सट्टा रॅकेटचे कनेक्शन यवतमाळ आणि पुण्यापर्यंत असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी त्यांची ओळख महेश सुरेश पाटकर (३४, रा. अंबा कॉलनी, अमरावती), अभिजीत अरुण पेटकर (३६, रा. आमनेर, वरूड) आणि सागर रामकृष्ण निंबर्ते (३०, रा. सावता मैदान, बडनेरा) अशी पटवली. त्यांच्याकडील लॅपटॉप आणि मोबाइलमध्ये सट्ट्याचे व्यवहार, 'खायवाडी' आणि 'लगवाडी'चे रेकॉर्डिंग तसेच बेकायदेशीर बेटिंग ॲप्स आढळले. आरोपींकडून ९ मोबाइल, २ लॅपटॉप, रजिस्टर आणि इतर साहित्य असा एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने, दीपक सुंदरकर, सुनील लासुरकर, जहीर शेख, सचिन बहाळे, अतुल संभे, सूरज चव्हाण, राजीक रायलीवाले आणि योगेश पवार यांनी केली. चौकशीदरम्यान, आरोपींनी सट्ट्यासाठीची आयडी यवतमाळ येथील रितेश जोशी याच्याकडून घेतल्याचे आणि सट्ट्याची 'उतारी' पुणे येथील गणेश उर्फ परेश मोहन भूत उर्फ अग्रवाल यांना देत असल्याचे सांगितले. त्यानुसार, रितेश जोशी आणि गणेश उर्फ परेश मोहन भूत यांचा शोध पोलीस घेत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 11:51 pm

अमरावती जिल्ह्यात शाळांच्या वेळेत बदल:उष्णतेमुळे 21 एप्रिलपासून सकाळी 7 ते 10 पर्यंतच वर्ग

अमरावती जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या संदर्भात आदेश जारी केला असून, त्यानुसार २१ एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळी ७ ते १० या वेळेतच भरतील. हा आदेश अनुदानित, विनाअनुदानित आणि खासगी अशा सर्व प्रकारच्या शाळांना लागू असेल. विदर्भात, विशेषतः अमरावती जिल्ह्यात, गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. हा आदेश २१ एप्रिलपासून पुढील १० दिवसांसाठी लागू राहील, त्यानंतर बहुतेक शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागतील. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी हा प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आला आहे. सकाळी १० नंतर कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरू ठेवता येणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरेसे पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था आणि उष्णतेपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात असाव्यात, अशी मागणी अनेक शिक्षक संघटनांनी केली होती. यापूर्वी २० मार्चपासून दुपारच्या शाळा सकाळच्या सत्रात भरण्यास सुरुवात झाली होती, परंतु त्यावेळी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या वेळा घोषित केल्या होत्या, ज्यामुळे काही ठिकाणी दुपारी १२ वाजेपर्यंत वर्ग सुरू होते. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून सकाळी ७ ते १० अशी एकसमान वेळ निश्चित केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 11:51 pm

दर्यापूर न्यायालयासमोरील झाडाखाली व्यक्तीचा मृतदेह आढळला:उष्माघाताने मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय, तपास सुरू

दर्यापूर येथील न्यायालयासमोर सोमवारी सायंकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. हा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांसह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीची ओळख दादाराव नकुल शिवरकर (वय ३५, रा. समता नगर, दर्यापूर) अशी पटली आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दादाराव शनिवारपासून येथील उपजिल्हा रुग्णालयात प्लेटलेट्स कमी झाल्याने उपचार घेत होते. सोमवारी दुपारी ते कोणालाही न सांगता उपजिल्हा रुग्णालयातून निघून गेले. कडाक्याच्या उन्हामुळे ते दर्यापूर न्यायालयासमोर असलेल्या कडूनिंबाच्या झाडाखाली बसलेले काही नागरिकांना दिसले. आजूबाजूच्या रहिवाशांनी त्यांना पाणीही दिले होते. त्यावेळी त्यांनी 'जास्त ऊन असल्यामुळे मी आराम करतो' असे सांगितले होते. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना दादाराव यांच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसली नाही, त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी तात्काळ दर्यापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून डॉक्टरांच्या मदतीने तपासणी केली असता, डॉक्टरांनी त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने आणि घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले होते. डॉक्टरांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. दादाराव शिवरकर यांचा मृत्यू उष्माघातानेच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रोहित सोनटक्के आणि जमादार दिलीप चव्हाण करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 11:50 pm

सहकार महर्षी क्रिकेट टर्फ-२०२६ चे विजेतेपद जागृती शुगरकडे

लातूर : प्रतिनिधी मांजरा परिवाराचे आधारस्तंभ माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रेणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजीत केलेल्या मांजरा परिवाराअंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता सहकार महर्षी क्रिकेट टर्फ-२०२६ स्पर्धेचे विजेतेपद जागृती शुगरच्या संघाने१५ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले, द्वितीय क्रमांक टेवन्टी-वन शुगर्स संघाने ११ हजार तर तृतीय क्रमांक विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर […] The post सहकार महर्षी क्रिकेट टर्फ-२०२६ चे विजेतेपद जागृती शुगरकडे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 10:16 pm

शेतक-यांच्या जीवनात क्रांती घडविणारे दिलीपरावजी

औसा : प्रतिनिधी शेतक-यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविणारे कल्याणकारी सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख हे असून एक आदर्श कल्याणकारी व्यक्तिमत्त्व त्यांची ओळख आहे. घरांतील सदस्यांना जसे आपण प्रेम करतो तसेच प्रेम त्यांनी सर्व शेतक-यांना दिले आहे, असे मार्गदर्शन ह. भ. प. बाळकृष्ण वसंतगडकर महाराज यांनी केले. सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित मातोळा येथील कीर्तन […] The post शेतक-यांच्या जीवनात क्रांती घडविणारे दिलीपरावजी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 10:15 pm

आईची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या  

किल्लारी : वार्ताहर खरोसा (ता. औसा) येथे कौटुंबिक वादातून किरकोळ कारणावरुन एका २२ वर्षीय विवाहितेने आपल्या २ चिमुकल्यासह विहिरी उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रविवारी रात्री मयत निकीता दिपक भुरे वय २२ राहाणार खरोसा हिने किरकोळ कौटुंबीक वादातून डोक्याला मनस्ताप करून टोकाचे पाऊल उचलले व आपल्या दोन चिमुकले १ मुलगा व १ […] The post आईची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 10:13 pm

राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी-शिक्षक आजपासून बेमुदत संपावर

मुंबई : प्रतिनिधी मोठया कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी राज्यातील १७ लाख सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी २१ एप्रिलपासून संपावर जाण्यावर ठाम आहेत. आमच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने कोणताही पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे आम्ही संपावर जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत. हा संप बेमुदत असणार आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानेही आम्हाला पाठिंबा दिला असल्याचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती […] The post राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी-शिक्षक आजपासून बेमुदत संपावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 9:57 pm

एल निनोच्या संभाव्य आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी सज्ज रहा

मुंबई : प्रतिनिधी संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे. यासाठी सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती तसेच पुनरुज्जीवन यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिले. भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर […] The post एल निनोच्या संभाव्य आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी सज्ज रहा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 9:50 pm

राज्यातील ९ आयपीएस अधिका-यांच्या बदल्या

मुंबई : प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांना मतदानापासून रोखल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले सातारचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली करण्यात आली आहे. दोशी यांची सांगलीच्या पोलिस अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर पुण्याचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांची बदली साताराचे पोलिस अधीक्षक […] The post राज्यातील ९ आयपीएस अधिका-यांच्या बदल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 9:49 pm

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य:सरकारच्या निर्णयाविरोधात गुणरत्न सदावर्ते मैदानात, म्हणाले- कायद्यात भाषेची सक्ती नाही

राजधानी मुंबईत मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण नेहमीच तापलेले असते, अशातच ज्या रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी लिहिता किंवा वाचता येत नाही, त्यांचे परवाने रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. येत्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, मराठीच्या आग्रहासाठी घेतलेल्या या भूमिकेला आता विरोधही सुरू झाला आहे. रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला असून, आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही या वादात उडी घेतल्याने हा पेच अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या 'कष्टकरी जनसंघाच्या' माध्यमातून ट्रान्सपोर्ट कमिशनर कार्यालयावर धडक देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. 1 मे हा दिवस महाराष्ट्र व देशभरात 'कामगार दिन' म्हणून साजरा केला जात असताना, रिक्षा व टॅक्सी चालकांवर कोणत्याही प्रकारचा मानसिक, सामाजिक किंवा प्रशासकीय दबाव आणणे चुकीचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. अशा महत्त्वपूर्ण दिवशी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी विधाने करणे हे बेकायदेशीर आणि संविधानविरोधी असल्याचे सांगत, सदावर्ते यांनी रॅपिडो व रिक्षाचालकांच्या वतीने आयुक्तांकडे या कामगारांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याची मागणी केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षाचालकांसाठी लागू केलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयाला विविध कामगार संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला असून, भाषेच्या नावाखाली कामगारांना त्रास देणे हे संविधानाच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याची भूमिका मांडली आहे. भाषा हे दडपशाहीचे साधन न होता संवादाचे माध्यम असावे, असे मत व्यक्त करत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालकांनी ट्रान्सपोर्ट कमिशनर यांची भेट घेतली. कोणत्याही चालकाला प्रशासनाकडून बेकायदेशीरपणे त्रास दिला जाणार नाही याची खात्री करणे ही प्रशासकीय जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत, या निर्णयाविरोधात प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. काय आहेत आंदोलकांच्या मागण्या? मराठी भाषेच्या सक्तीवरून आंदोलकांनी प्रशासनासमोर आपल्या प्रमुख मागण्या मांडल्या असून, भाषेच्या नावाखाली केली जाणारी कोणतीही बेकायदेशीर कारवाई तातडीने थांबवण्यात यावी, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. चालकांचे बॅज किंवा परवान्यांबाबत कोणतीही कारवाई करताना योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे आणि तसे स्पष्ट आदेश जारी करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याशिवाय, प्रसारमाध्यमांमध्ये पसरणाऱ्या भ्रामक विधानांबाबत प्रशासनाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी आणि आगामी 1 मे पासून कोणत्याही चालकावर अन्यायकारक किंवा बेकायदेशीर कारवाई होणार नाही, याची ठोस खात्री प्रशासनाने द्यावी, असेही या मागण्यांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 9:36 pm

आमची सर्व कागदपत्रे कायदेशीर:MIM नगसेविका सहर शेख म्हणाली- सगळे आरोप बिनबुडाचे; वानखेडेवरील फोटोवरही स्पष्टीकरण

ठाणे महानगरपालिकेच्या एमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, गेल्या काही दिवसांपासून 'नॉट रिचेबल' असलेल्या सहर शेख यांनी अखेर समोर येत आपली बाजू मांडली आहे. मुंब्रा पोलिस ठाण्यात पोलिसांशी चर्चा केल्यानंतर करारा जवाब मिलेगा असा इशारा देणाऱ्या सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत, आमची सर्व कागदपत्रे कायदेशीर आणि खरी असल्याचा दावा केला असून विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून 'नॉट रिचेबल' असलेल्या एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी अखेर माध्यमांसमोर येत आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. मीडियाकडून खोट्या बातम्या पसरवून घराघरात अफवा पोहोचवण्यात आल्या, त्यामुळे आता सत्य समोर आणण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे म्हणत त्यांनी पत्रकारांनाच धारेवर धरले. उत्तर देण्यासाठी उशीर का झाला, हे ठरवण्याचा अधिकार माध्यमांना नसून तो आमचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे त्यांनी सुनावले. तसेच, आपल्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असून अद्याप न्यायालयाने कोणताही निकाल दिला नसताना मीडिया आपल्याला दोषी कसे ठरवू शकते, असा संतप्त सवालही सहर शेख यांनी यावेळी उपस्थित केला. सहर शेख म्हणाल्या, तुम्ही एका ताकदवर आमदाराला हरवत आहात, अत्यंत संघर्ष करत, वडिलांना साथ देत तुम्ही निवडणूक जिंकला आहात, तर तो आनंद तुम्हाला होत असतो. त्यामुळे, कैसे हराया... ही माझी आतमधून, मनातून आलेली स्टेटमेंट आहे. मात्र, याच गोष्टीला घेऊन बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. वानखेडे स्टेडियमवरील फोटोबाबत स्पष्टीकरण सहर शेख या वानखेडे स्टेडियमवर असल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, आमच्या गटनेत्याने पत्रकारांना सांगितले की, आमच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले, पण दुसऱ्या दिवशी मी वानखेडे स्टेडियमवर दिसले असा आरोप तुमच्याकडून केला जात आहे. मात्र, निधन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मी वानखेडेवर गेले असे गटनेत्याने सांगितले का? असा सवाल शेख यांनी उपस्थित केला. तसेच सगळे कन्फ्युजन पसरवले जात असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 9:19 pm

तान्ह्याचं नमन राजे…!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांचा बहुप्रतिक्षित आणि महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. अलीकडेच सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर समोर येताच प्रेक्षकांसह मनोरंजन विश्वातही या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली. टीझर पाहिल्यानंतर अनेक दिग्गज कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीतून व्यक्त केलेली […] The post तान्ह्याचं नमन राजे…! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 9:02 pm

उपवर्गीकरणाच्या विरोधात अहवालाचे सामूहिक दहन

लातूर : प्रतिनिधी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात दि. २० एप्रिल रोजी सकाळी शहरातील महात्मा गांधी चौकात मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनाने जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावेळी न्या. बद्दर अहवालाचे प्रतिकात्मक सामुहिक दहन करून शासनाच्या भूमिकेचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […] The post उपवर्गीकरणाच्या विरोधात अहवालाचे सामूहिक दहन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 8:55 pm

लिंगायतांनी जनगणनेमध्ये नोंद करताना धर्माच्या रकान्यात लिंगायत लिहावे 

लातूर : प्रतिनिधी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात मानवतावादी अनुभव मंटपाच्या माध्यमातून लिंगायत धर्म संस्कार दिले. त्यामुळे लिंगायतांनी जनगणनेमध्ये आपली नोंद करताना धर्माच्या रकान्यात ‘लिंगायत’ म्हणून धर्माची नोंद करावी, असे आवाहन लिंगायत शरण फांऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष माधवराव पाटील टाकळीकर यांनी केले. यासंदर्भात कर्नाटक राज्यात प्रबोधनात्मक चळवळ सुरू झाली आहे. तशी चळवळ आम्ही महाराष्ट्रात […] The post लिंगायतांनी जनगणनेमध्ये नोंद करताना धर्माच्या रकान्यात लिंगायत लिहावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 8:54 pm

विलासराव देशमुख फाउंडेशनतर्फे ७३ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान 

लातूर : प्रतिनिधी विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने प्रभाग क्र. १७ मधील तुळजाभवानीनगर येथे सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा यशस्वी समारोप सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणा-या ७३ महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे […] The post विलासराव देशमुख फाउंडेशनतर्फे ७३ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 8:53 pm

८९, ५०० रुपयांची अवैध दारू जप्त 

लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री व हातभट्टी निर्मितीविरोधात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने उपविभाग लातूर ग्रामीण हद्दीत दि. १९ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेने २ ठिकाणी प्रभावी कारवाई करून ८९ लाख ५०० रुपयांचीर अवैध दारू जप्त केली आहे. पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील माटेफळ गावातील आण्णा भाऊ […] The post ८९, ५०० रुपयांची अवैध दारू जप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 8:51 pm

अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल

इस्लामाबाद : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव निवळण्यासाठी प्रस्तावित असलेल्या इस्लामाबाद २.० शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे अमेरिकेची विमाने शस्त्रास्त्रे आणि सुरक्षा संसाधनांसह पाकिस्तानात दाखल झाली असताना, दुसरीकडे इराणच्या राष्ट्रपतींनी आता युद्ध थांबवा अशी आर्त साद घातली आहे. मात्र, या चर्चेत सहभागी होण्याबाबत इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप सस्पेन्स कायम ठेवला […] The post अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 8:47 pm

संभाव्य एल निनोला टक्कर देण्यास महाराष्ट्र सज्ज:उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा- CM देवेंद्र फडणवीस

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे. यासाठी सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासह कृषी, मदत व पुनर्वसन, वित्त, जलसंपदा, जलसंधारण, भारतीय हवामानशास्त्र विभाग, वित्त व नियोजन विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत एल निनोचा सर्वाधिक परिणाम जाणवण्याची शक्यता असून पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मे महिन्यात उष्णतेची तीव्रता तुलनेने कमी राहील, मात्र उष्णतेच्या लाटा अधिक प्रमाणात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली. दरम्यान, पॉझिटिव्ह ‘आयओडी’ विकसित झाल्यास एल निनोच्या परिणामांची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते, असेही यावेळी सांगण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, २०१५ मध्ये पावसाळा संपल्यानंतर राज्यातील पाणीसाठा केवळ ४५ टक्के होता, मात्र सध्या पावसाळा सुरू होण्यापूर्वीच तितका साठा उपलब्ध आहे. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास राज्याला या परिस्थितीचा सक्षमपणे सामना करता येईल. २०१५ मधील एल निनोच्या कालावधीतील अनुभवावरून २०१८ या वर्षी उपाययोजना केल्यामुळे पिके वाचविता आली. एल निनोच्या कालावधीत पावसातील अनियमिततेमुळे विशेषतः मराठवाड्यात मोठा परिणाम दिसून आला होता. दोन पावसाच्या सरींमध्ये दीर्घ खंड पडल्यास पिकांवर ताण येतो, मात्र संरक्षित सिंचनाच्या माध्यमातून पिकांचे नुकसान कमी करता येते. त्यामुळे जलसंधारण व पाणी साठवण क्षमतेत वाढ करणे अत्यावश्यक आहे. जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार या योजनांची कामे तातडीने आणि मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या कामांसाठी वित्त विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच जुन्या जल स्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवनाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. यामुळे कमी पैशात जास्त पाणी साठा उपलब्ध होईल. कमी पावसाच्या परिस्थितीतही सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणारी हीच साधने प्रभावी ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘जी रामजी योजने’तून होणारी जलयुक्त शिवारची कामे योग्य प्रकारे झाली आहेत की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच जी रामजी मधून जास्तीत जास्त कामे मिळविण्यासाठी टास्क फोर्स तयार करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील पर्जन्यमान ९० टक्क्यांपेक्षा कमी राहिल्यास पिण्याच्या पाण्यासह शेतीवर मोठा परिणाम होतो. अशा परिस्थितीत नुकसान कमी करण्यासाठी पूर्वतयारी करण्यात यावीत. मनरेगा योजनेअंतर्गत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच पिण्याच्या पाण्याबाबत केवळ चालू वर्षाचा नव्हे, तर पुढील उन्हाळ्याचाही विचार करून नियोजन कराव्यात. पावसातील संभाव्य घट लक्षात घेऊन पाणी साठवून ठेवणे आणि त्याचा काटेकोर वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पाणी बचतीसाठी आणि इतर पूरक उपाययोजनांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्यात यावे. जिल्हाधिकारी, सिंचन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समन्वयातून पाण्याचा काटेकोर वापर आणि साठवणूक सुनिश्चित केली जावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत पशुधनासाठी चारा टंचाई होऊ नये यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. एल निनोचा परिणाम इतर राज्यांवरही होण्याची शक्यता असल्याने बाहेरील राज्यांवर अवलंबून न राहता राज्यातच वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत. धरणांच्या बॅक वॉटर क्षेत्रात वैरण विकास कार्यक्रम हाती घेण्यात यावा. मोठ्या प्रमाणात पशुधन असणाऱ्या तसेच चारा टंचाई जाणविणाऱ्या सोलापूर, सांगली आणि मराठवाडा या भागांमध्ये चारा उपलब्ध कसा होईल, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या. खतांच्या उपलब्धतेबाबत तात्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी. ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ प्रणालीशी खत वितरण जोडून पारदर्शकता वाढविणे, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तपासणी यंत्रणा मजबूत करण्यावर भर देण्यात यावा, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. शेततळे योजनेवर भर द्यावा - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर कृषी विषय प्रभावीपणे हाताळण्यासाठी कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. उद्भवू शकणाऱ्या संभाव्य अडचणींचा पूर्वानुमान करून त्यासाठी आवश्यक तयारी करण्यावर भर देण्यात आला आहे. यंदाच्या पावसातील अनिश्चिततेमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर खतांचा पुरवठा होणे अत्यावश्यक आहे. विशेषतः डीएपी खताचे वितरण नियोजनबद्ध पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले जाणार आहेत. खते आणि बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सर्व विक्री केंद्रांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे भरणे यांनी सांगितले. कृषिमंत्री भरणे म्हणाले की, पावसाच्या अनियमिततेमुळे चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावरही उपाययोजना करण्यात येत आहेत. महाबीज तसेच इतर बियाणे व चारा पुरवठा करणाऱ्या संस्थांना आवश्यक साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुबार पेरणीची वेळ उद्भवल्यास अतिरिक्त बियाण्यांचा पुरवठा करण्यासाठीही संबंधित संस्थांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना पाणी साठवणुकीसाठी शेततळे योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात यावा. त्यासाठी आवश्यक साहित्य, विशेषतः प्लास्टिक लाइनिंग उपलब्ध करून देण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी कृषी विभाग पूर्णपणे सज्ज संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी कृषी विभाग पूर्णपणे सज्ज असून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात येत असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव के. एच. गोविंदराज, बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, पर्यावरण विभागाचे सचिव जयश्री भोज, पशुसंवर्धन सचिव एन रामास्वामी, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव माणिक गुरसाळ, राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण, भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक साई कृष्णन आदींसह उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थानचे संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक, आयमेट वेदर सर्व्हिसेसचे संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र संचालक उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 8:36 pm

कौटुंबिक वादाचा भीषण अंत:लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईने विहिरीत उडी मारली; परिसरात खळबळ

लातूर जिल्ह्यात हृदयद्रावक घटनांची मालिका सुरूच असून, चाकूर येथील 6 वर्षीय चिमुरड्याचा त्याच्याच चुलतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता खरोसा येथे एका विवाहित महिलेने कौटुंबिक वादातून आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. एकामागून एक घडलेल्या या भीषण आणि खळबळजनक घटनांमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून, खरोसा येथील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे कौटुंबिक वादातून एक अत्यंत मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. निकिता अमरदीप भूरे (वय 25) या विवाहित महिलेने पतीसोबत झालेल्या टोकाच्या वादातून आपली दोन लहान मुले, शिवानी आणि शिवांश यांच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून मोठे भांडण झाले होते. याच रागाच्या भरात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास निकिता आपल्या दोन्ही चिमुरड्यांना घेऊन घराबाहेर पडल्या, ज्याचा शेवट या भीषण दुर्घटनेत झाला. सोमवारी सकाळपासून निकिता आणि मुलांचा शोध घेतला जात होता, मात्र दुपारच्या सुमारास घराशेजारील विहिरीत तिघांचेही मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले आहेत. एकाच वेळी आईसह दोन निष्पाप जीवांचा अंत झाल्याने खरोसा गावासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 8:22 pm

संजीवनी जीवनरक्षक पुरस्कार-2026 ची घोषणा:जीव वाचवणाऱ्यांचा हेल्प रायडर्सतर्फे सन्मान होणार

हेल्प रायडर्स संस्थेने 'संजीवनी जीवनरक्षक पुरस्कार-२०२६' ची घोषणा केली आहे. मानवतेची सेवा आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्पर मदत करणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. पुढाकार घेतलेल्या हेल्प रायडर्स संस्थेने समाजात एक सकारात्मक ओळख निर्माण केली आहे. संस्थेचे प्रमुख कार्य म्हणजे वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून देणे, अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणे आणि इतर आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी धावून जाणे. या कार्यामुळे अनेक जीव वाचले आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत कनोजिया यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ उभी राहिली आहे. कोरोना काळात प्लाझ्मा, औषधे आणि अत्यावश्यक वस्तू पुरवून संस्थेने अनेकांचे प्राण वाचवले. तसेच पूरग्रस्त भागात मदतकार्य आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. सध्या संस्थेचे कार्य विविध शहरांमध्ये विस्तारले असून शेकडो स्वयंसेवक या सेवाकार्यात सहभागी झाले आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रशांत कनोजिया म्हणाले की, समाजात जीव वाचवण्याच्या कार्यात योगदान देणारे, अपघातग्रस्तांना मदत करणारे किंवा आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने पुढाकार घेणाऱ्या नागरिकांनी संस्थेशी संपर्क साधावा. महाराष्ट्रासह देशभरातील अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी पुढे येऊन आपल्या कार्याची नोंद संस्थेकडे करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. 'संजीवनी जीवनरक्षक पुरस्कार-२०२६' सोहळ्याचे आयोजन पुण्यात शनिवार, ६ जून २०२६ रोजी करण्यात आले आहे. या पुरस्काराचे हे पहिले वर्ष असून, यापुढे दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. अधिक माहितीसाठी व सहभाग नोंदणीसाठी ९९७०२३९९९९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. या पत्रकार परिषदेला हेल्प रायडर्सचे समन्वयक अनुपम शहा, बाळासाहेब ढमाले आणि श्रीकांत कापसे उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 8:09 pm

युवक काँग्रेसकडून ‘पाच अभियानां’ची घोषणा:सामाजिक तणाव, जातीय प्रश्न, अंधश्रद्धेविरोधात राज्यभर जनजागृती मोहीम

युवक काँग्रेसने राज्यात 'पाच अभियानां'ची घोषणा केली आहे. सामाजिक तणाव, जातीय प्रश्न आणि अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे आणि अभिषेक अवचार यांनी ही माहिती दिली. ‘रोहित वेमुला, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश’ या विचारवंतांच्या नावाने ही पाच अभियानं राबवली जातील. शिवराज मोरे यांनी सांगितले की, समाजात, विशेषतः ग्रामीण भागात आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये जात विचारण्याची प्रवृत्ती वाढत आहे. ही बाब चिंताजनक असून, लहान मुलांमध्येही ही प्रवृत्ती दिसून येत आहे, जी समाजासाठी धोकादायक आहे. विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांसाठी लढणारी ताकद म्हणून युवक काँग्रेस उभी राहावी, या उद्देशाने ‘रोहित वेमुला अभियान’ सुरू करण्यात येत आहे. अंधश्रद्धेविरोधात लढा देण्यासाठी ‘दाभोळकर अभियान’ राबवले जाईल. या अंतर्गत ग्रामीण भागात बुवाबाजी आणि अंधश्रद्धेविरोधात जनजागृती केली जाईल. ‘पानसरे अभियान’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक इतिहासाची माहिती युवकांपर्यंत पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करेल. इतिहासाचे विकृतीकरण थांबवून योग्य विचार पुढे नेणे ही काळाची गरज असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. ‘कलबुर्गी अभियान’ आणि ‘गौरी लंकेश अभियान’ अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विचारस्वातंत्र्य याबाबत जागृती करतील. पत्रकारांमध्ये वाढत चाललेली भीती आणि दबाव यावरही या मोहिमेतून आवाज उठवला जाईल, असे मोरे यांनी नमूद केले. अभिषेक अवचार यांनी स्पष्ट केले की, ही मोहीम कोणत्याही राजकीय फायद्यासाठी नसून समाजप्रबोधनासाठी आहे. टीका आणि विरोध सहन करत हे काम सातत्याने सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. विविध ठिकाणी विज्ञान परिषद, पदयात्रा, चर्चासत्रे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ही जनजागृती केली जाईल. या अभियानाची सुरुवात पुण्यातून होणार असून, १ मे रोजी महाराष्ट्र दिनी पहिला मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात मोहिमेची सविस्तर रूपरेषा मांडली जाईल. पुणे हे शिक्षणाचे केंद्र असल्याने येथून दिलेला संदेश संपूर्ण राज्यात पोहोचतो, त्यामुळे सुरुवात पुण्यातून केली जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 8:08 pm

पुणे बालपुस्तक जत्रा 30 एप्रिलपासून:गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे 4 मे पर्यंत विनामूल्य आयोजन

पुणे बालपुस्तक जत्रेचे ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही जत्रा विनामूल्य भरवण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना वाचनाची गोडी लागावी, कला संस्कृतीची माहिती मिळावी आणि त्यांना साहित्य संस्कृतीचा स्पर्श व्हावा, हा या जत्रेचा मुख्य उद्देश आहे. मुलांसोबत पालक आणि शिक्षकांनाही नावीन्यपूर्ण कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रसाद मिरासदार उपस्थित होते. मागील वर्षी या महोत्सवाला मुलांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता, ज्यात सुमारे ५५ ते ६० हजार मुलांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी बालसाहित्याची ७५ दालने होती, जी यंदा १०० पर्यंत वाढवण्यात आली आहेत. या वर्षीच्या जत्रेत साहित्य आणि कलासंस्कृतीच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यात बालसाहित्याची शंभर दालने, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रामीण व साहसी खेळ, तसेच खाद्यजत्रेतून खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येणार आहे. मुलांचे गीतरामायण, किशोर मासिकांच्या मुखपृष्ठांचे प्रदर्शन, बाल साहित्य लेखन स्पर्धा, मुलांचे कविसंमेलन, पपेट शो, पथनाट्य कार्यशाळा, लेखक तुमच्या भेटीला, चिंटू तुमच्या भेटीला, नाट्यनगरी कार्यशाळा, जादूचे खेळ आणि विविध प्रकारचे प्रशिक्षण असे कार्यक्रम अनुभवता येतील. मुलांना साहित्य आणि कलेची गोडी लागावी यासाठी अधिकाधिक पुणेकरांनी आपल्या मुलांसोबत या जत्रेला भेट देऊन साहित्य संस्कृतीला पुढे नेण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सुनील महाजन यांनी केले आहे. जत्रेत सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 8:07 pm

बनावट एटीसी परवानग्यांचा पुण्यात महाघोटाळा उघड:विमान अपघाताचा धोका; विकासक-अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

पुणे शहरात बनावट एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) परवानग्यांच्या आधारे उंच इमारती उभारल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. यामुळे विमान अपघाताचा धोका निर्माण झाला असून, विकासक आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या प्रकरणी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. विकासक आणि महापालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमताने हे बनावट परवाने मिळवून इमारतींना मंजुरी दिल्याचे समोर आले आहे. शहरातील आंबेगाव, बिबवेवाडी आणि सिंहगड रोड परिसरातील उंच इमारतींच्या मंजुरीमध्ये अनियमितता असल्याचा आरोप आहे. एअर फोर्सच्या गांधीनगर कार्यालयाने महापालिकेला कळवले आहे की, आंबेगाव येथील एका प्रकल्पासाठी सादर केलेली परवानगी 'पूर्णपणे बनावट' आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून हे परवाने मिळवण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. याबाबत शिवसेनेचे पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना निवेदन दिले आहे. ६ एप्रिल रोजी पुरावे देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप घरत यांनी केला. एनडीए आणि मिलिटरीची संवेदनशील ठिकाणे पुण्यात असताना, सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवणे हा राष्ट्रद्रोहाचा प्रकार असल्याचे घरत यांनी म्हटले आहे. खासदार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. भ्रष्टाचाराच्या या इमारतींना तात्काळ टाळे ठोकून दोषी अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही घरत यांनी दिला.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 8:05 pm

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'माझे समकक्ष' म्हटलेय:डीबेटच्या आव्हानावरून चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर, नेमके काय म्हणाल्या?

महिला विधेयकावरून सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यांवरून विरोधकांच्या प्रश्नांचे उत्तरे दिली असून जोरदार हल्लाबोलही केला. तसेच त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डीबेटसाठी तयार असल्याचे म्हटले होते. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, मला असे वाटतेय बारामतीच्या मोठ्या ताई त्यांनी म्हटले आहे की मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत डीबेट करायला तयार आहे. ताईंनी जितके प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच दिले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे देवेंद्रजींनी त्यात म्हटले आहे की माझे समकक्ष जे नेते असतील त्यांच्यासोबत मी डीबेट करायला तयार आहे. म्हणजे पवार साहेब यांनी जर विनंती केली आणि ते तयार असतील तर निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री हे माननीय पवार साहेबांसोबत डीबेट करतील, असे म्हणत वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील महिला विधेयकाला विरोध केला. त्यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, दुर्दैव आहे की ज्या महिलांनी, ज्या महिला खासदारांनी विरोध केला, या सगळ्या कुठल्या न कुठल्या राजकीय पार्श्वभूमीच्या महिला आहेत. कोणाचे वडील आहेत, कोणाचा पती आहे, कोणाचा भाऊ आहे. आज या 33 टक्क्यांची आवश्यकता होती, ज्यासाठी मोदीजींचा प्रयत्न आहे की सर्वसाधारण ज्यांच्या मागे कुठल्याही राजकारणाचा इतिहास भूगोल नाही, अशा महिला संसदेतही येणार होत्या आणि देशाच्या प्रत्येक विधानसभेतही येणार होत्या. पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, इतक्या महिलांनी जे स्वप्न पाहिले होते, त्याचा चक्काचूर करण्याचे काम यांनी केले आहे. आणि त्यात महिला खासदार ज्या त्या ठिकाणी आहेत, त्यांचाही समावेश आहे, हे दुर्दैव आहे. जल्लोष केला गेला हे आणखी दुर्दैव आहे. मला त्यांना सांगायचे आहे की नक्की जल्लोष कराच तुम्ही, आता देशातल्या आणि राज्यातल्या महिलांचा शंखनाद तुम्हाला ऐकायला येईल, तो शंखनाद तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. चित्रा वाघ म्हणाल्या, संसदेत इतक्या सध्या सोप्या भाषेत हे बिल समजावले आहे, या बिलावर जे काही आक्षेप होते ते सुद्धा सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत त्याचे निरासण करण्यात आले आहे. असे असून सुद्धा जर सभागृहात बसलेल्या महिला प्रश्न विचारात असतील तर मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्यावरच आहे.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 7:47 pm

शेतक-यांसमोर दुहेरी संकट

मार्च आणि एप्रिल महिन्याच्या प्रारंभी अवकाळी पाऊस आणि ओला दुष्काळ पडल्याने गहू, मोहरी, कडधान्य, बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकट्या महाराष्ट्रात २ लाख हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवरचे पीक वाया गेले आहे. राजस्थानात बिकानेरच्या अर्जुनसर भागातील शेतक-यांच्या मते, त्यांचा गहू, मोहरी आणि तृणधान्याचे पीक मातीमोल झाले. पीक विम्याची भरपाई उशिरा मिळत असल्याने अडचणीत वाढ झाली आहे. […] The post शेतक-यांसमोर दुहेरी संकट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 7:43 pm

धक्कादायक! लातूरमध्ये सात वर्षांच्या चिमुरड्याची सख्ख्या काकूनेच केली हत्या; आरोपी महिलेला अटक

लातूर (प्रतिनिधी): चाकूर परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या सात वर्षीय देवांश मंगेश स्वामी याच्या खून प्रकरणाचा लातूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत यशस्वी उलगडा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आपल्या पतीला आणि त्याच्या कथित प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी सख्ख्या काकूनेच या निरागस बालकाचा बळी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आरोपी अनिता दिनेश स्वामी हिला पोलिसांनी बेड्या […] The post धक्कादायक! लातूरमध्ये सात वर्षांच्या चिमुरड्याची सख्ख्या काकूनेच केली हत्या; आरोपी महिलेला अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 6:52 pm

‘आरएसएस’च्या सुरक्षेचा खर्च हा जनहिताचा विषय नाही

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस ) आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना पुरवण्यात येणा-या ‘झेड प्लस’ व्हीव्हीआयपी सुरक्षेचा खर्च करदात्यांच्या पैशातून केला जात आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर भार पडत असून हा खर्च सरसंघचालक यांच्याकडूनच वसूल करण्यात यावा, अशा आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली. नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते ललन […] The post ‘आरएसएस’च्या सुरक्षेचा खर्च हा जनहिताचा विषय नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 6:26 pm

ट्रम्प यांना ‘वॉर रूम’पासून दूर ठेवले

वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान इराणमध्ये अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्यामुळे व्हाईट हाऊसमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या सहाय्यकांवर ओरडत होते. यादरम्यान जेव्हा प्रशासनाचे अधिकारी हे इराणध्ये अडकलेल्या वैमानिकाला वाचवण्यासाठी ‘हाय-रिस्क’ मोहिमेची आखणी करत होते, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना त्या खोलीच्या म्हणजेच वॉर-रूमच्या बाहेर ठेवण्यात आले होते, असे वृत्त वॉल स्ट्रीट […] The post ट्रम्प यांना ‘वॉर रूम’पासून दूर ठेवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 6:11 pm

भाजपच्या राज्यात 'नारीशक्ती' बाजूला:जनगणना अन् परिसीमनाचा संबंध जोडताना मुख्यमंत्र्यांची उडाली गाळण, काँग्रेसचा टोला

काँग्रेसने मुख्यमंत्र्यांनी महिला आरक्षणावरून काँग्रेसवर केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत महिला नेत्या उपस्थित होत्या. पण महिलांचा पुळका दाखवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना या महिलांना साधे आपले मत मांडू द्यावे असेही वाटले नाही. अर्थात भाजपच्या राज्यात नारीशक्ती अशीच बाजूला राहते, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यासंबंधी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना म्हणाले की, मुख्यमंत्री साहेबांच्या पत्रकार परिषदेत महिला मंत्री व नेत्या उपस्थित होत्या; मात्र महिलांचा पुळका दाखवणाऱ्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना या महिलांना आपले मत मांडू द्यावे, अशी आवश्यकता वाटली नाही. असो. मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, जनगणना आणि परिसीमनाचा महिला आरक्षण विधेयकाशी संबंध जोडताना त्यांची गाळण उडालेली स्पष्ट दिसली. त्यांची संपूर्ण पत्रकार परिषद मूलतः परिसीमन आणि जनगणना या विषयांवरच केंद्रित होती. भाजपच्या राज्यात ‘नारीशक्ती’ अशीच बाजूला सारून ठेवलेली आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले. ते म्हणाले, आमचा मुख्य प्रश्न असा आहे की, २०२३ च्या ‘नारीशक्ती’ विधेयकाचा जनगणना व परिसीमनाशी संबंध कोणी आणि का जोडला? २०२३ चे हे विधेयक एकमताने मंजूर झाले होते; परंतु त्यात मोदी सरकारने जनगणना आणि परिसीमनाची अट तसेच १० वर्षांची मुदत का घातली? काँग्रेस पक्षाने महिला आरक्षण तातडीने लागू करण्याची मागणी तेव्हाही केली होती. ती मागणी मान्य केली असती, तर २०२४ मध्येच महिलांना आरक्षण मिळाले असते. आताही विद्यमान ५४३ खासदारांमध्येच महिलांना आरक्षण लागू करता येऊ शकते; परंतु तसे केल्यास निवडून आलेल्या सुमारे १/३ म्हणजेच १८१ पुरुष खासदारांना घरी बसावे लागेल, म्हणून ते टाळले जात आहे. ही भूमिकाच महिला विरोधी आहे. जनगणनेची अट घालण्याची गरज काय होती? सचिन सावंत म्हणाले, आता मूळ मुद्दा २०२३ च्या ‘नारीशक्ती’ विधेयकातील जनगणना आणि परिसीमनाची अटीचा! २००९ मधील परिसीमन २००१ च्या जनगणनेनंतर लागू करण्यात आले होते. मग २०२६ च्या जनगणनेची वाट पाहण्यात नेमकी अडचण काय आहे? या जनगणनेत जातीय जनगणना होणार आहे. मग ओबीसी, अनुसूचित जाती-जमातींवर २०११ च्या जनगणनेच्या आधारे अन्याय होत नाही का? या विधेयकात ओबीसी महिलांचा समावेश का नाही? आणि जर २०११ ची जनगणनाच ग्राह्य धरणार होता, तर २०२३ च्या विधेयकात जनगणनेची अट घालण्याची गरज काय होती? शिवाय, हे विधेयक आणले तेव्हा कोविडचा काळही संपलेला होता. जर सर्व प्रदेशांत ५०% जागा वाढवायच्या असतील, तर ते विधेयकात स्पष्ट का करण्यात आले नाही? याचे समाधानकारक उत्तर अमित शहा यांनी दिलेले नाही. संविधानाच्या कलम ८१ नुसार १९७१ च्या जनगणनेला ‘फ्रीज’ करण्यात आले आहे, त्यामुळे छोट्या राज्यांना प्रतिनिधित्वाचे संरक्षण मिळते. ५०% वाढ केली, तरी हे संरक्षण धोक्यात येऊ शकते. प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचनेनंतर उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व ८० वरून १२०, बिहारचे ४० वरून ६०, मध्य प्रदेशचे २९ वरून ४७, तामिळनाडूचे ३९ वरून ५९ आणि केरळचे २० वरून ३० जागांपर्यंत वाढेल. जरी सर्व राज्यांच्या जागा वाढणार असल्या, तरी उत्तरेकडील राज्यांना सुमारे २७० जागांची वाढ मिळेल, तर दक्षिणेकडील राज्यांना केवळ ६६ जागांची वाढ होईल. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात उत्तरेकडील राज्यांचे वर्चस्व अधिक बळकट होईल, असे सावंत म्हणाले. हा संघराज्य व्यवस्थेवर आघात नाही का? ते पुढे म्हणाले, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील जागांचा फरक ३२ वरून ४८ पर्यंत वाढेल. याची चिंता मुख्यमंत्र्यांनी करणे आवश्यक आहे. मोठ्या राज्यांचा सरकार स्थापनेत आणि कायदे प्रक्रियेत प्रभाव अधिक वाढेल, तर दक्षिणेकडील राज्यांची वाटाघाटीची ताकद तुलनेने कमी होईल. सर्वात गंभीर बाब म्हणजे, परिसीमन हे प्रत्येक जनगणनेनंतर करणे संविधानाने बंधनकारक केले आहे (सध्या १९७१ ची जनगणना ‘फ्रीज’ आहे). मात्र या विधेयकातून कोणती जनगणना ग्राह्य धरायची, हा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. राज्यांमध्ये परिसीमन कशा पद्धतीने करायचे, हेही संसद ठरवणार असेल, तर हा संघराज्य व्यवस्थेवर आघात नाही का? २०२३ मध्ये महिला आरक्षणासाठी १० वर्षे वाट पाहावी लागेल, असे सांगणाऱ्या भाजपला अचानक महिला आरक्षणाची घाई लागली. तीही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या आदर्श आचारसंहितेच्या काळात, हे न समजण्याइतके जनता भोळी नाही. सचिन सावंत म्हणाले, मणिपूर दंगलीदरम्यान दोन महिलांवर झालेले अत्याचार, हाथरस आणि उन्नाव येथील घटना, महिला ऑलिम्पियन खेळाडूंशी झालेले वर्तन, तसेच बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना दिलेला सन्मान, या प्रत्येक वेळी मोदीजी शांत राहिले. मोदी सरकारमध्ये हरदीप सिंह पुरी यांसारखे मंत्री आहेत, ज्यांचे दोषी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांच्याशी संबंध असल्याचे आरोप झाले आहेत. १६५४ आमदारांपैकी फक्त १६४ महिला भाजपच्या २४० खासदारांपैकी केवळ ३१ महिला (सुमारे १२%) आहेत. तसेच देशभरातील १६५४ आमदारांपैकी फक्त १६४ महिला (१०% पेक्षा कमी) आहेत. २१ मुख्यमंत्र्यांपैकी भाजपकडून केवळ एकच महिला मुख्यमंत्री आहे. याशिवाय, भाजपाच्या देशातील काही आमदारांवर गंभीर बलात्काराचे आरोप आहेत, आणि ५४ खासदार व आमदारांची नावे खून व बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या बरोबर भाजपा मधील महिला विरोधी नेत्यांच्या वाढीची चिंता मुख्यमंत्र्यांनी असली पाहिजे, असे सावंत म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 6:01 pm

दुचाकीस्वाराकडील 2 लाखांची रोकड लुटणारे अटकेत:कोयत्याचा धाक दाखवून लुटलेल्या आरोपींकडून मुद्देमाल जप्त

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर कोयत्याचा धाक दाखवून दुचाकीस्वाराकडील दोन लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नऱ्हे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट तीनने ही कारवाई केली असून, आरोपींकडून दोन लाख रुपये रोख, दुचाकी, कोयता आणि मोबाईल असा एकूण तीन लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना नऱ्हे परिसरातील एका मद्य विक्री दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत घडली होती. चोरट्यांनी त्याला कोयत्याचा धाक दाखवून दोन लाख रुपये लुटले आणि पसार झाले होते. या प्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नऱ्हे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तपास पथकाला माहिती मिळाली की, लूटमार करणारे दोघे जण बाह्यवळण मार्गावरील श्री स्वामी नारायण मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत थांबले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून यश सतीश खवले (वय २०, रा. स्वास्तिक सोसायटी, नऱ्हे) आणि ऋषीकेश उद्धव लाखे (वय २०, रा. साई व्हिला सोसायटी, नऱ्हे) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत दोघांनी लूटमार केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून लुटलेली दोन लाख रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, कोयता आणि मोबाईल असा एकूण तीन लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार, नऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, उपनिरीक्षक किरण लिटे, विजयसिंह घाडगे, नीलेश भोरडे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, प्रणिल मेस्त्री, किशोर शिंदे, कैलास लिम्हण, पुरुषोत्तम गुन्ला आणि योगेश झेडे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 5:38 pm

पक्षात कोणालाही डावलले जात नाही:ते स्वतःच्या मतांवर निवडून आले म्हणत असतील तर.., शंभूराज देसाईंचे महेश शिंदेंना प्रत्युत्तर

सातारा जिल्ह्यात जर शिवसेनेची ताकद नाही असे आमदार महेश शिंदे म्हणत असतील, ते स्वतःच्या मतांवर निवडून आले असे म्हणत असतील तर तो शिवसैनिकांचा अवमान ठरेल, असे मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले आहे. तसेच पक्षात कोणालाही डावलले जात नाही, असेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे. महेश शिंदे यांनी पक्षात आपल्याला वेगळी वागणूक मिळत असल्याची टीका केली होती. यावर आता शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले की, शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या दौऱ्यावेळी वेगळे निमंत्रण देण्याची पद्धत नाही. कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित असते. काही बॅनरवर महेश शिंदे यांचे फोटो नव्हते, मात्र त्यांना कार्यक्रमाची माहिती देण्याचे आदेश जिल्हाप्रमुखांना देण्यात आले असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे. महेश शिंदे यांना डावलले जात आहे का? यावर उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, अनेक बैठकीत त्यांनी स्वतः शिंदे उपस्थित आहेत का याची चौकशी केली आहे. जर त्यांना निमंत्रण मिळाले नाही, असा दावा केला जात असेल, तर त्याची चौकशी केली जाईल, असेही देसाई यांनी म्हटले आहे. तसेच महेश शिंदे यांनी स्वतःच्या ताकदीवर निवडून आल्याचे वक्तव्य केले असेल तर ते शिवसैनिकांचा अपमान ठरेल. जिल्ह्यातील सर्व निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे शिवसैनिकांच्या ताकदीवरच निवडून आले असल्याचे देसाई यांनी म्हटले. सातारा जिल्ह्यात शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीने 37 जागा जिंकून बहुमत मिळवले असून, जिल्ह्यात 100 हून अधिक लोकप्रतिनिधींच्या निवडीतून शिवसेनेची ताकद सिद्ध झाल्याचे शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीपासूनच शंभुराज देसाई आणि आमदार महेश शिंदे यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली असून, या वादावर आगामी काळात पक्षश्रेष्ठी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे?:महेश शिंदेंचा स्फोटक सवाल, शिंदे गटात खदखद उफाळली; साताऱ्यात शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर? साताऱ्यातील राजकारणाला पुन्हा एकदा ताप आला असून शिवसेना शिंदे गटातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षात खळबळ उडवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रथमच जाहीर भूमिका घेतली. विशेष म्हणजे त्यांनी थेट पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप करत आपल्याला कार्यक्रमांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचा दावा केला. या विधानामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 5:36 pm

मला काही झाले तर संभाजी भिडेंचे धारकरी जबाबदार:माझ्या जीवितास धोका, संरक्षण द्यावे; विकास लवांडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांना गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. वारकरी संप्रदायाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने लवांडे यांना या धमक्या येत असल्याचे समजते. यावरून विकास लवांडे यांनी ट्विट करत संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच मला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणावसी यांच्याकडे केली आहे. विकास लवांडे म्हणाले, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्र पोलिस आपणास पुनश्च विनंती की, मला संभाजी भिडे यांचे धारकरी आणि काही हिंदुत्ववादी बुवा बाबांचे समर्थक मला फोन करून दररोज शिवीगाळ, दमदाटी, जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. मेसेज करत आहेत, फोन करून त्रास देत आहेत. मी कुठेही कोणाचाही कसलाही अवमान केलेला नाही. मी वारकरी संप्रदायाचा एक पाईक आहे. पुढे विकास लवांडे म्हणाले, भागवत वारकरी संप्रदायाच्या संदर्भात तात्विक वैचारिक मांडणी करत आहे. मात्र माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असून मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच पंढरपूर, श्रीरामपूर, नेवासा इत्यादी ठिकाणी माझ्या विरुद्ध खोट्या निराधार तक्रार अर्ज देऊन गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न चालू आहेत. मला फोन करून मेसेज करून त्रास देणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी. मी कायदा आणि लोकशाही पाळणारा जबाबदार कार्यकर्ता आहे. माझ्या जीवितास काही कमी जास्त झाल्यास मला फोन करणारे संभाजी भिडे यांचे धारकरी आणि कट्टर हिंदुत्ववादी सर्वस्वी जबाबदार राहतील त्यांनी यापूर्वी सुद्धा मला एक वर्षापूर्वी धमक्या व घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता. तसेच मला संरक्षण मिळावे, अशी मागणी विकास लवांडे यांनी केली आहे. दरम्यान, यापूर्वी म्हणजे 17 एप्रिल रोजी विकास लवांडे यांनी ट्विट करत म्हटले होते की, भास्कर गिरी महाराजांचे नेवासा भागातील हिंदुत्ववादी भक्त मला सकाळपासून फोन करून जीवे मारण्याची दमबाजी, शिवीगाळ करत आहेत. याचा अर्थ तिकडे किती कट्टरवाद जोपासला गेला आहे ते कळते. खरे वारकरी असे हिंसक गुंड प्रवृत्तीचे नसतात. केवळ धर्मांध रुजवली आहे. मला दमबाजी, धमक्या, शिवीगाळ करणाऱ्या व फोन, मेसेज करून जाणीवपूर्वक रीतसर कायदेशीर तक्रार करतोय, अशी माहिती त्यांनी दिली होती.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 5:18 pm

राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग

पचपदरा : राजस्थानच्या पचपदरा येथील बहुप्रतिक्षित रिफायनरीमध्ये सोमवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा उद्याच, २१ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रिफायनरीचे औपचारिक उद्घाटन होणार होते. या आगीमुळे रिफायनरीचे मोठे नुकसान झाले असून उद्याच्या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिफायनरीच्या एका […] The post राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 4:52 pm

'महिलांच्या हक्कांवर कॉंग्रेसचा घाव':शिवसेना शिंदे गटाचा एल्गार, संजय निरुपम यांच्या नेतृत्वात वर्सोव्यात निदर्शने

लोकसभेत शुक्रवारी (दि.17 एप्रिल) महिला आरक्षण कायद्यात सुधारणा करणारे विधेयक (131 वी घटनादुरुस्ती) मतदानानंतर नामंजूर झाली. या मतदानात एनडीए दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यात अपयशी ठरली. या विधेयकाच्या बाजूने 298 मते पडली, तर 230 मते विरोधात पडली. त्यानंतर महिला आरक्षण विधेयकावरून सरकारने विरोधकांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. 18 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशाला संबोधित करताना कॉंग्रेस आणि विरोधकांवर भ्रूणहत्या केल्याचा आरोप करत जोरदार टीका केली होती. आता मुंबईच्या वर्सोवा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून देखील कॉंग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. 'महिलांच्या हक्कांवर कॉंग्रेसचा घाव' 'महिलांच्या हक्कांवर कॉंग्रेसचा घाव' असे म्हणत शिवसेना शिंदे गटाने संजय निरुपम यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच हे आकडे फक्त मतदान नाही तर कॉंग्रेसची महिला विरोधी असणारी खरी मानसिकता आहे. नारी शक्ती वंदन अधिनियमाला विरोध म्हणजे महिलांच्या सशक्तीकरणालाच नकार, अशी टीका शिंदे गटाने केली आहे. पंतप्रधान मोदींची कॉंग्रेसवर टीका दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना म्हटले की, देशातील कोट्यवधी महिलांची नजर संसदेकडे लागलेली होती. नारी शक्तीचा हा प्रस्ताव जेव्हा फेटाळला गेला, तेव्हा काँग्रेस, सपा, टीएमसी, डीएमके सारख्या घराणेशाही पक्षांनी आनंद साजरा केला, हे पाहून मला दुःख झाले. वैयक्तिकरित्या मला अपेक्षा होती की आपली दशकांपूर्वीची चूक सुधारेल आणि पापांचे प्रायश्चित्त करेल. पण काँग्रेसने इतिहास घडवण्याची आणि महिलांच्या पाठीशी उभे राहण्याची संधी गमावली, अशी टीका मोदींनी केली होती. दरम्यान, केंद्र सरकारच्या कायदा मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 16 एप्रिल 2026 पासून 'महिला आरक्षण कायदा 2023' लागू झाला असून त्याद्वारे संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. तथापि, प्रस्तावित 131 व्या घटनादुरुस्ती विधेयक 2026 नुसार हे आरक्षण मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर (डिलिमिटेशन) लागू करण्याचे सरकारने प्रस्तावित केल्यामुळे विरोधकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला असून, हे आरक्षण भविष्यातील वाढीव जागांच्या निकषावर नव्हे, तर लोकसभेच्या विद्यमान 543 जागांवरच तत्काळ लागू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 4:52 pm

पश्चिम बंगालमध्ये ७ लाख नवीन मतदारांची भर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी मतदानापूर्वी राज्यातील मतदार यादीत सुमारे ७ लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. या वाढीव मतदारसंख्येमुळे राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी आयोगाने या मतदारांचे सखोल तपशील जाहीर केलेले नाहीत. सात लाख नवीन मतदारांपैकी सुमारे ३.२२ […] The post पश्चिम बंगालमध्ये ७ लाख नवीन मतदारांची भर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 4:50 pm

तिशीतील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतोय रक्तदाब

नवी दिल्ली : तरुण वयात, विशेषत: तीशीच्या आसपास रक्तदाब किंचित वाढला तरी भविष्यात हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, अशी माहिती एका नव्या संशोधनातून समोर आली आहे. सामान्य समजल्या जाणा-या पातळीत असलेला रक्तदाबही पूर्णपणे सुरक्षित नसून त्यात होणारी वाढ दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम करू शकते, असे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या संशोधनात सुमारे ६,००० प्रौढ व्यक्तींचा २० […] The post तिशीतील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतोय रक्तदाब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 4:42 pm

भेंडवळच्या घटमांडणीला अंनिसचे आव्हान:श्याम मानव म्हणाले - 10 कुंडल्यांचे 90% अचून भविष्य वर्तवा अन् 80 लाख घ्या

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी भेंडवळच्या पाऊस व हवामानाविषयी अंदाज वर्तवणाऱ्या घटमांडणीला आव्हान दिले आहे. आम्ही 10 कुंडल्या व सध्याची माहिती देऊ. घटमांडणी करणाऱ्यांनी त्याची 90 टक्क्यांहून अधिक अचूक भविष्यवाणी करून दाखवावी. असे केले तर त्यांना 80 लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे ते म्हणालेत. बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दरवर्षी घटमांडणीद्वारे वर्षभरातील पीकस्थिती, पावसाचे प्रमाण, तसेच सामाजिक, आर्थिक व राजकीय घडामोडींसह देशाची संरक्षण स्थितीचा अंदाज वर्तवण्यात येते. नुकतीच ही घटमांडणी जारी करण्यात आली. त्यात देशाच्या सद्यस्थितीवर विविध भाष्य करण्यात आले. या पार्श्वभूमीवर श्याम मानव यांनी या घटमांडणीला आव्हान दिले आहे. ते म्हणाले, मागील 5 वर्षांत ह्या घटमांडणीचे कोणतेही अंदाज खरे ठरले नाहीत. वारंवार त्याच त्या गोष्टी फिरवून सांगितल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी या घटमांडणीच्या अंदाजावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. ही घटमांडणी करणाऱ्यांना आम्ही 10 कुंडल्या व सध्याची माहिती देऊ. त्यांनी त्याचा 90 टक्क्यांहून अधिक अचूक अंदाज वर्तवून दाखवावा. असे केले तर आम्ही त्यांना तब्बल 80 लाख रुपयांचे बक्षीस देऊ. आजच्या काळात हवामान अंदाजासारख्या गोष्टी विज्ञान व अभ्यासावर आधारित आहेत. त्या विज्ञानाच्या कसोटीवर पडताळून पाहता येतात. पण भेंडवळ किंवा ज्योतिषाच्या दाव्यांना तेवढी शास्त्रीय पडताळणी नाही. पूर्वी शेतकरी अनुभवानुसार निर्णय घेत होते. पण आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे परिस्थिती बदलली. लोकांना फसवण्यासाठी आता श्रद्धेचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रथांविरोधात जनजागृती करण्याची गरज आहे, असे श्याम मानव म्हणाले. भेंडवळची भविष्यवाणी आजच जाहीर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सायंकाळी भेंडवळची घटमांडणी करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी तिचे अंदाज जाहीर करण्यात आले. त्यानुसार, देशाचा राजा म्हणजे पंतप्रधान हे त्यांच्या खुर्चीवर कायम राहतील. पण ते कायम तणावात राहतील. देशाची संरक्षण स्थितीही कमकुवत राहील. त्याचा संरक्षण खात्यावर मोठा ताण असेल. शेतकऱ्यांना हे वर्ष अडचणीचे ठरू शकते. यंदा सर्व पिकांवर रोगराईचे सावट राहील. पण कापूस व तीळ मोठ्या प्रमाणात पिकेल. त्यांना चांगला भावही मिळेल. ज्वारी, तूर, मुग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिके सर्वसाधारण येतील. श्याम मानवांचा भोंदूबाबांवरही संताप व्यक्त उल्लेखनीय बाब म्हणजे श्याम मानव यांनी रविवारीच नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला होता. तसेच एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठीच हे प्रकरण पुढे आणल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते, एकनाथ शिंदेंमुळे आज अशोक खरात घरोघरी पोहोचले आहे. खरात हा शिंदेंचा बाबा नसता आणि रुपाली चाकणकर त्याची भक्त नसती, तर हे प्रकरण केव्हाच समोर आले नसते. कदाचित पोलिसांना सुरुवातीलाच हे प्रकरण दाबण्याच्या सूचना मिळाल्या असत्या. पण शिंदे व राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी पोलिसांना हे प्रकरण उत्तमपणे हाताळण्याच्या सूचना मिळाल्या.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 4:39 pm

भोंदू बाबांचे प्रस्थ सरकार पुरस्कृतच:'अंनिस'च्या श्याम मानव यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा

सध्या राज्यात भोंदू खरात प्रकरण गाजत आहे. प्रदीप मिश्रा, धिरेंद्र शास्त्री, बागेश्वर यांच्या सारखे बुवा बाबांचे मोठं प्रस्थ वाढत आहे. अशोक खरातवर कारवाई करण्यात आली ते योग्यच झाले. पण धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर आणि इतरांवर कारवाई का नाही? असा सवाल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी उपस्थित केला. राज्यात बुवा बाबांचे प्रस्थ वाढवण्याचे, त्यांना प्रतिष्ठा देण्याचे काम सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला. भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरण गाजत आहे. या पार्श्वभूमीवर अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून 'वृक्ष तिथे छाया... बुवा तिथे बाया' जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत असून बुलढाणा येथे श्याम मानव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक विश्राम भवन येथे आज 20 एप्रिल रोजी शाम मानव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्याची स्थिती व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य यावर त्यांनी भूमिका मांडली. पुढे बोलताना प्रा. मानव म्हणाले, काँग्रेसच्या काळात बुवा बाबांवर एफआयआर दाखल करताना पोलीस स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचे तर आता सरकारच्या संमतीशिवाय काहीही करता येत नाही. खरातसारख्या भोंदू बुवा बाबांना प्रतिष्ठा देण्याचे काम देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातूनच सुरू आहे. ते पुढे म्हणाले, बीजेपी मंत्रिमंडळातील एका मोठ्या मंत्र्यांने मुख्यमंत्री होण्यासाठी खरात बाबाकडे पूजा केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर त्यावर कारवाई झाली. वास्तविक पाहता धीरेंद्र शास्त्री व प्रदीप मिश्रा यांच्यावरही आरोप आहे. कायद्यानुसार या दोघांवर कारवाई करने सहज शक्य आहे. मात्र खरात सारखा न्याय या लोकांना लावण्यात आलेला नाही. खरात वाईट व इतर चांगले असे होऊ शकत नाही. गेल्या काही वर्षापासून जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार व प्रचार आणि अंमलबजावणी करण्यात येत नाही. अजितदादा पवार यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली होती. कामही सुरू झाले, मात्र फडणवीस यांनी नुसते झुलवत ठेवले. सरकारने या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याबाबत पूर्ण उदासीनता दाखवली आहे. हा कायदा राबवायचाच नाही असे त्यांचे ठरले असल्याचे श्याम मानव म्हणाले. अधिकाऱ्यांवर, यंत्रणांवर फार मोठे दडपण आहे. अशी अवस्था आपण अख्या आयुष्यात कधी पाहिली नाही. काँग्रेसच्या काळात गुलाब बाबाचे भक्त शंकराव चव्हाण आणि सत्यसाईबाबा भक्त विलासराव देशमुख सारखे मोठे मुख्यमंत्री असताना देखील त्यांच्या विरोधात पोलिस कारवाई करीत. आता साधा नगरसेवक येऊन काम बंद पाडतो. अलीकडच्या काळात जादूटोणाविरुद्ध कायद्याचा प्रचार प्रसार झाला असता तर खरात सारखा बाबा उदयास आलाच नसता. या प्रकरणात अनेक लोक अडकले त्याला जबाबदार राज्य सरकार असल्याचा घनाघात त्यांनी केला. रूपाली चाकणकर देखील आरोपीच खरात प्रकरणाची सुरुवात एका पत्रकारापासून झाली. ज्या पत्रकाराने आवाज उठवला त्याला फोन करून रूपाली चाकणकर यांनी दम भरला होता. आरोपीला सहाय्य करणे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणे हा गुन्हा आहे.त्यामुळे रूपाली चाकणकर यामध्ये आरोपी आहे असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांचा सहभाग तपासला पाहिजे खरात वर ॲक्शन होण्याचे पुन्हा एक कारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि रूपाली चाकणकर यांच्याशी असलेली जवळीक असू शकते. त्याचे संबंध कसे आहे हा पोलिस तपासाचा भाग आहे.भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने मुख्यमंत्री होण्यासाठी पूजा केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष प्रकरणाकडे गेले व खरात वर कारवाई झाली असे श्याम मानव पत्रकार परिषदेत म्हणाले. या पत्रकार परिषदेला अ.भा. अंनिस राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, मराठवाडा संघटक किशोर वाघ,जिल्हा संघटक प्रमोद टाले, जिल्हा अध्यक्ष डॉ. मनोहर तुपकर,सुनील भाऊ जावंजाळ पाटील, दत्ताभाऊ सिरसाठ, महिला संघटक प्रतिभा भुतेकर, सचिव आशिष गवई, विवेक हिवाळे, सुमेध जाधव ,नानाभाऊ मोरे आदींची उपस्थिती होती.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 4:25 pm

गझल लिहिताना आकृतिबंधाचा विचार गरजेचा : प्रा. मिलिंद जोशी

पुणे : प्रतिनिधी गझल लिहिताना आकृतिबंधाचा विचार होणे ज्याप्रमाणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे लिखाणात आशय आणि शब्दांचा ओलावा असणे आवश्यक असते. गझल लेखनात आचारसंहिताही पाळली गेली पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ व्याख्याते व लेखक प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली. रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्काराने गझलकारा अमिता पैठणकर यांचा (दि. १९) […] The post गझल लिहिताना आकृतिबंधाचा विचार गरजेचा : प्रा. मिलिंद जोशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 4:18 pm

विरोधकांनी ७० कोटी महिलांचा विश्वासघात केला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, १७ एप्रिल हा दिवस देशाच्या राजकीय व सामाजिक वाटचालीतील एक महत्त्वाचा ठरेल अशी अपेक्षा होती. एक निर्णायक क्षण ठरेल असे वाटले होते. पण दुर्दैवाने काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, ठाकरे गट, शरद पवार गट, समाजवादी पार्टी आदी विरोधी पक्षांनी आपल्या महिलाविरोधी मानसिकतेचे प्रदर्शन करत या विधेयकाला आवश्यक ते दोन […] The post विरोधकांनी ७० कोटी महिलांचा विश्वासघात केला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 4:03 pm

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन:डॉ. मुजुमदार म्हणाले, 'भारताची प्रतिभा' कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्त्वाचा मिलाप

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या 'भारताची प्रतिभा' या पुस्तकाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले. यावेळी पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी प्रतिभाताई पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करत, त्या कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्त्वाचा मिलाप असल्याचे म्हटले. धर्म ही शक्ती आहे, अत्याचार करणारे शास्त्र नाही, तसेच आपली राज्यघटना धर्मग्रंथाप्रमाणे मानायला हवी, असे विचार प्रतिभाताई नेहमी मांडत असत, असेही डॉ. मुजुमदार यांनी नमूद केले. 'भारताची प्रतिभा' या पुस्तकात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाविषयी देश आणि राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेले निवडक लेख मराठी भाषेत समाविष्ट करण्यात आले आहेत. पुणे परिवारतर्फे आयोजित या प्रकाशन सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, महापौर मंजुषा नागपुरे, राजेश पांडे, मधुकर भावे, आयोजक ज्योती राठोर, सुरेश उज्जैनवाला, पुणे परिवाराचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी आणि भाग्यश्री ठाकरे आदी उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, प्रतिभाताईंनी आयुष्यभर समाजसेवा केली आणि नवे विचार रुजवले. त्यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. त्यांच्या कार्यकाळात अनेक महामंडळे स्थापन झाली. त्यामुळे शासन म्हणून 'भारताची प्रतिभा' हे पुस्तक जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, हे पुस्तक प्रतिभाताईंच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा प्रवास उलगडते. जळगावमधील एका सामान्य कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास विलक्षण आहे. एक हळवी माता ते देशाच्या सेनापतीपर्यंतचा त्यांचा कणखर प्रवास या पुस्तकातून अनुभवता येईल. प्रास्ताविकात पुणे परिवाराचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी यांनी सांगितले की, प्रतिभाताई पाटील यांच्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळातील राजकीय आणि सामाजिक जीवन प्रवासावर आधारित 'भारताची प्रतिभा जीवन गौरव ग्रंथ' यापूर्वीच प्रकाशित झाला आहे. प्रस्तुत पुस्तकात त्यातील मान्यवरांचे निवडक लेख घेण्यात आले आहेत. हे पुस्तक त्यांच्या दुर्दम्य व्यक्तिमत्त्व व गुणवैशिष्ट्यांचा ठेवा असून, नव्या पिढीसाठी राज्यातील सर्व शाळा व ग्रंथालयांना वितरित करण्यात येणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा यथोचित सन्मान देखील करण्यात आला. यामध्ये सैनिकांसाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारणाऱ्या वीरमाता सुमेधा चिथडे, आंतरराष्ट्रीय मल्लखांब पटू अदिती देशपांडे, डॉ.विनिता आपटे, भाग्यश्री चौंडे यांचा समावेश होता. मधुकर भावे यांनी देखील आठवणी सांगितल्या.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 3:53 pm

शेतकऱ्यांना २ लाखांच्या कर्जमाफीचा निर्णय लवकरच:मुख्यमंत्री याविषयी अत्यंत सकारात्मक, कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती

राज्य सरकार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा दिलासा देण्याच्या भूमिकेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निर्णयाविषयी सकारात्मक आहेत. त्याअनुषंगाने आवश्यक माहिती गोळा करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. शेतकरी गरजेपोटी पीक कर्ज किंवा इतर कर्ज घेतात. नवीन घेतलेल्या कर्जाचा भरणा शेतकरी करत असले तरी, त्यांच्या थकबाकी कर्जाबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल. ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे भरणे यांनी सांगितले. यावेळी कृषी आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. सध्या युरिया खताचा तुटवडा जाणवत असून, त्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे कृषी मंत्री म्हणाले. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्वासन भरणे यांनी दिले. धरणातील उपलब्ध पाणी आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करून जलसंपदा विभागामार्फत शेतकऱ्यांना आगामी काळात आवश्यक पाणी दिले जाईल. मान्सून काळात शेतकऱ्यांनी शेततळे यांसारख्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, ज्यात सरकार मदत करेल. यावर्षी सरासरीच्या ९२ ते ९३ टक्क्यांपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज आहे. राज्याची बियाण्यांची गरज २० लाख क्विंटल असून, सध्या २८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. आगामी काळात तापमान वाढणार आणि पाऊस कमी पडणार असल्याने काही कामांना प्राधान्य दिले जाईल. पेरणी करताना उभी पेरणी करण्याऐवजी आडवी पेरणी करावी, कमी पाण्याचे पीक घ्यावे आणि खताचा मर्यादित व आवश्यक तेवढाच वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. कोणत्या शेतकऱ्यांनी किती युरिया नेला आहे, याबाबत तपासणी केली जात आहे. अनेकांनी ४० बॅग युरिया नेल्याबाबत संशय असून, त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 20 Apr 2026 3:51 pm

नागपूरमध्ये धर्मांतराचा दबाव ; संचालक रियाज काझी अटकेत

नागपूर : प्रतिनिधी नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणानंतर आता उपराजधानी नागपूरमध्येही तत्सम स्वरूपाचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मानकापूर परिसरातील एका स्वयंसेवी संस्थेच्या आड तरुणींवर मानसिक छळ, विनयभंग आणि धर्मांतरासाठी दबाव करण्यात आल्याच्या घटना घडत आहेत. ‘युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी’ या नावाने ही संस्था चालवली जात असल्याचे समोर आले आहे. या […] The post नागपूरमध्ये धर्मांतराचा दबाव ; संचालक रियाज काझी अटकेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Apr 2026 3:50 pm