अमरावती महानगरपालिकेच्या आगामी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि युवा स्वाभिमान पार्टी (वायएसपी) यांनी रविवारी अर्ज उचलले. ३० जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी सुट्टी असल्याने, मंगळवारीच उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल. भाजपच्या लता देशमुख यांनी महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांसाठी अर्ज उचलले आहेत. युवा स्वाभिमान पार्टीकडून सचिन भेंडे, अजय जैस्वाल आणि प्रशांत वानखडे या तीन नगरसेवकांनी उपमहापौर पदासाठी अर्ज उचलले आहेत. प्रशांत वानखडे यांनी दोन अर्ज घेतले आहेत. अर्ज उचलण्याची आणि दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी सकाळी ११.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयातून पूर्ण केली जाईल. त्यामुळे या निवडणुकीत किती नगरसेवक प्रत्यक्ष अर्ज दाखल करतात, हे मंगळवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली बैठक शुक्रवार, ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बोलावण्यात आली आहे. या बैठकीत, सुरुवातीच्या १५ मिनिटांत वैध आणि अवैध अर्जांची यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर पुढील १५ मिनिटे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर, सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांना हात उंचावून मतदान करावे लागेल. ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतील, त्याला विजयी घोषित केले जाईल. या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पीठासीन अधिकारी म्हणून निवड केली आहे. उमेदवाराला आपला अर्ज मागे घ्यायचा असल्यास, सूचक किंवा अनुमोदक यापैकी एका नगरसेवकाच्या संमतीने लेखी अर्ज सादर करावा लागेल. एकदा दिलेला अर्ज कोणत्याही परिस्थितीत परत घेता येणार नाही. ही प्रक्रिया ३० जानेवारीच्या बैठकीतील पहिल्या १५ मिनिटांत पूर्ण केली जाईल.
गट नोंदणीसाठी ठाकरे गट, YSPचाच अर्ज:१५ फेब्रुवारीपर्यंत मुदत, इतर पक्ष निश्चिंत
अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह इतर समित्यांमध्ये समान प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या गट नोंदणी प्रक्रियेला अद्याप अपेक्षित वेग आलेला नाही. विभागीय आयुक्तांकडे आतापर्यंत केवळ युवा स्वाभिमान पार्टी (वायएसपी) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोनच पक्षांनी गट नोंदणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. हे अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त नितीन कापडणीस यांच्या कार्यालयात जमा झाले असून, ते लवकरच विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठवले जातील. गट नोंदणीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत असल्याने, तसेच महापालिकेच्या पहिल्या बैठकीत केवळ महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार असल्याने इतर पक्ष सध्या निश्चिंत आहेत. मात्र, स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड करण्याच्या बैठकीपूर्वी गट नोंदणी करणे सर्व पक्षांसाठी बंधनकारक आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एका महिन्याच्या आत संबंधित नगरसेवकांना आपले गट तयार करून विभागीय आयुक्तांची मान्यता मिळवावी लागते. राजकीय पक्षांच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा गट निश्चित असतो, परंतु ते इतर नगरसेवकांना सोबत घेऊन आपल्या गटाची सदस्य संख्या वाढवू शकतात. यामुळे संबंधित पक्षाला अधिकचे समान प्रतिनिधित्व मिळण्यास मदत होते. तसेच, कमी सदस्य संख्या असलेल्या नगरसेवकांनाही स्थायी आणि इतर विषय समित्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळवता येते. महापालिका सभागृहात भाजप २५ सदस्यसंख्येसह सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेस आणि युवा स्वाभिमान पार्टी प्रत्येकी १५ सदस्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर एमआयएम १२ नगरसेवकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ११ सदस्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. बहुजन समाज पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट) प्रत्येकी ३, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) २ आणि वंचित बहुजन आघाडीकडे १ नगरसेवक आहे. प्रमुख चार पक्षांचे गट वगळता, ३, २ किंवा १ सदस्य असलेल्या पक्षांना स्वबळावर समान प्रतिनिधित्व मिळवणे अशक्य आहे. त्यामुळे या सदस्यांना इतरांना सोबत घेऊन किंवा इतर मोठ्या गटांमध्ये सामील होऊन प्रतिनिधित्व मिळवावे लागेल. दरम्यान, युवा स्वाभिमान पार्टीने नोंदणीसाठी दाखल केलेल्या गटाला 'नगर सुधार आघाडी' असे नाव दिले आहे. मूळ पक्षाचे नाव बदलून नवीन आघाडीचे नाव दिल्याने, त्यांनी आपल्या १५ नगरसेवकांव्यतिरिक्त आणखी काही नगरसेवकांना सोबत घेतले असल्याचे स्पष्ट होते.
संरक्षण क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेमुळे 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी झाले, असे प्रतिपादन पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) सेवानिवृत्त समूह संचालक काशीनाथ देवधर यांनी केले. ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित एका व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) संयुक्त विद्यमाने डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्र सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. देवधर यांनी 'ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत' या विषयावर मार्गदर्शन केले. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, पुणे येथील माजी प्राचार्य डॉ. नागनाथ धर्माधिकारी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रवींद्र कडू आणि विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. देवधर यांनी १९६५ च्या युद्धाचा संदर्भ देत, त्यावेळी भारताला शस्त्रास्त्रांसाठी परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागले होते, असे सांगितले. देवधर पुढे म्हणाले की, भारताने नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारला आहे, 'युद्ध नको, बुद्ध हवा' हे भारताचे धोरण आहे. मात्र, कोणीही भारताच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. २०१४ नंतर भारताने दहशतवादाविरोधात 'जशास तसे' उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे घेतला. या कारवाईत भारताने पाकिस्तानच्या नागरी वस्त्या किंवा लष्कराला लक्ष्य न करता, केवळ दहशतवादी ठिकाणांना नेस्तनाबूत केले. भारताने पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले. पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर त्यांच्या विनंतीवरून भारताने युद्ध थांबवले, असेही देवधर यांनी स्पष्ट केले. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी आपल्या भाषणात 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेवर भर दिला. भारताला अधिक आयात करावी लागत असल्याने स्वावलंबी होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने दिलेला 'आत्मनिर्भर भारत' हा मंत्र तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी अमर कतोरे याने सादर केलेल्या देशभक्तीपर गीताने झाली, तर मंजरी बहादुरे या विद्यार्थिनीने गायिलेल्या 'वंदे मातरम्' गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
परळी नगरपालिकेतील भ्रष्टाचाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी गत सहा दिवसांपासून नगरपालिका कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या वैजनाथ सुरवसे यांनी प्रजासत्ताकदिनी नगरपालिका इमारतीवरुन आत्महत्येचा प्रयत्न केला. तब्बल दीड तास चाललेला हा हायव्होल्टेज ड्रामा पोलिसांनी सुरवसे यांना ताब्यात घेतल्यानंतर थांबला. परळी नगरपरिषदेत २००१ ते २०२६ या कालावधीत २ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला. हा भ्रष्टाचार करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करुन कारवाई करावी, या मागणीसाठी वैजनाथ सुरवसे मागील 6 दिवसांपासून नगरपालिका कार्यालयापुढे उपोषणाला बसले होते. पण अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर आज प्रजासत्ताकदिनी त्यांनी इमारतीच्या छतावर चढून तेथून उडी मारण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित घटनेमुळे पोलिस अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी सुरवसे यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आपला एक पाय इमारती खाली व एक पाय छतावर ठेवत तेथून उडी मारण्याचा इशारा दिला. यामुळे अधिकाऱ्यांना आहे त्याच ठिकाणी थांबावे लागले. फेसबुक लाईव्ह करत उडी मारण्याचा प्रयत्न या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वतः वैजनाथ सुरवसे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे तो व्हायरल केला आहे. त्यांच्या मते, परळी नगरपालिकेत गत २५ वर्षात भक्ती एंटप्रायजेस या बोगस कंत्राटादाराने २ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला आहे. यामध्ये सहभागी असलेल्या मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, संतोष रोडे, आशिषकुमार अनिलकुमार दीक्षित, बापू नरवडे आणि संबंधीत १५ प्रशासकीय अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी. त्यांना निलंबित करण्यात यावे. या मागणीसाठी त्यांनी मागील २१ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. अधिकारी जवळ जाताच उडी मारण्याचा इशारा सोमवार दि. २६ जानेवारी रोजी नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते ध्वाजारोहण झाल्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास सुरवसे यांनी नगरपालिका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील छतावर चढत फेसबुक लाईव्ह करत उडी मारुन आत्महत्या करण्याचा इशारा दिला. हा प्रकार नगरपालिका प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यास खाली येण्याच्या सुचना केल्या. परंतु कर्मचारी व नागरीक त्याच्या जवळ जाताच तो उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे आत्महत्येचा हा ड्रामा दुपारी दीड वाजेपर्यंत सुरु होता. अखेर पोलिसांनी त्यास पकडून ताब्यात घेतले.
भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या संचलनात आज विविध राज्य व मंत्रालयांच्या चित्ररथांनी भारताचा संपन्न सांस्कृतिक वारसा व विकसित भारताचे दर्शन घडवले. यात महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गणेशोत्सवाच्या संकल्पनेवर आधारित हा चित्ररथ कर्तव्य पथावर येताच गणपती बाप्पा मोरयाचा एकच गजर ऐकू आला. भारताचा 77 व्या प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा नवी दिल्ली या देशाच्या राष्ट्रीय राजधानीतील कर्तव्य पथावर पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी चित्तथरारक कवायतींच्या माध्यमातून आपल्या शौर्याचे प्रदर्शन केले. यावेळी विविध राज्य व मंत्रालयाच्या चित्ररथांनी देशाचा संपन्न सांस्कृतिक वारसा व विकसित भारताचे दर्शन घडवले. यावेळी महाराष्ट्राच्या गणेशोत्सवावर आधारित चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्राने यंदा चित्ररथासाठी राज्यातील प्रमुख उत्सव असलेल्या गणेशोत्सवाचा विषय निवडला होता. संचलनासाठी तयार करण्यात आलेल्या खास चित्ररथात डोक्यावरून नेण्यात येणारी गणेशमूर्ती, गणेशमूर्तीचे रंगकाम करणारा कलाकार, ढोलपथकात ढोल वाजवणारी महिला, अष्टविनायकांच्या प्रतिकृती, गणेश मंदिराची प्रतिकृती असा जिवंत देखावा मांडण्यात आला होता. या चित्ररथासोबत असलेल्या कलाकारांनी उत्कृष्ट नृत्याविष्कार करून हा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दुसरीकडे, कर्तव्य पथावरील संचालनामध्ये देशातील 17 राज्ये व 13 मंत्रालयांचे मिळून एकूण 30 चित्ररथ सहभागी झाले होते. यावेळी तिन्ही सैन्य दलांच्या जवानांनी थरारक प्रात्यक्षिकेही दाखवली. प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा व युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन उपस्थित होत्या. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्यदलांच्या जवानांचे अभिवादन स्वीकारले. तसेच संचलनात सहभागी झालेल्या कलाकारांच्या कलागुणांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख पाहुण्यांना कर्तव्य पथावरील संपूर्ण कार्यक्रमाची व विविध चित्ररथामधून दाखवण्यात आलेल्या भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.
मराठमोळा रील स्टार तथा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचे निधन झाले आहे. त्याच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यासह सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रथमेश गत काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्या मित्राने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या निधनाची दुःखद बातमी सार्वजनिक केली. प्रथमेश कदम व त्याची आई प्रज्ञा कदम यांचे रील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. प्रथमेश कदमचा जवळचा मित्र तथा सोशल मीडिया स्टार तन्मय पाटेकरने त्याच्या निधनाची पुष्टी केली आहे. 'तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश. देवाघरी स्वत:ची काळजी घे रे, खूप आठवण येईल तुझी, मिस यू भाई', अशा शब्दांत तन्मयने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तन्मयने प्रथमेशसोबतचा एक फोटोसुद्धा शेअर केला आहे. तन्मयच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत श्रद्धांजली वाहिली आहे. प्रथमेश कदमच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली होती. त्याने ही जबाबदारी सांभाळलीच, शिवाय या दुःखावर मात करत आपल्या आईलाही धीर दिला. गत अनेक वर्षांपासून तो आपल्या आईसोबत सोशल मीडियावर रील करत होता. त्यांचे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत होते. एवढेच नव्हे तर मराठी कलाकारांनीही या माय-लेकाच्या व्हिडिओला दाद दिली होती. त्यामुळे त्याच्या निधनामुळे सर्वच स्तरावर हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रथमेशने गत महिन्यात एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्याने आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला होता. तसेच आपल्या आजारपणावरही भाष्य केले होते. त्यानंतर तो रुग्णालयात भरती झाला होता. तिथेही त्याने अनेक मजेशीर व्हिडिओ पोस्ट करत लोकांचे मनोरंजन केले होते. नवीन वर्षात त्याचे एक गाणेही प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तोच त्याचा अखेरचा व्हिडिओ ठरला. प्रथमेशच्या व्हिडिओवर नेटकरी कमेंट्स करून त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.
पालांदुरचे नागरिक तहानलेलेच:हर घर जल योजना फलकापूरतीच मर्यादीत, यंदा तरी मिळणार का जल जीवनचे पाणी?
लाखनी तालुक्यातील १०४ गावांपैकी ८२ गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे उरकण्यात आली आहेत.अशा ८२ गावांप्रमाणेच पालांदूर या गावातही जलजीवन मिशनचे वास्तव आजही कागदावरच असल्याचे चित्र आहे.'हर घर जल' या घोषणेखाली योजना मंजूर झाली,भूमिपूजन झाले, फलकही उभे राहिले; मात्र आजही अनेक घरांपर्यंत नळाचे पाणी पोहोचलेले नसल्याची वस्तुस्थिती दिसून येत आहे. पालांदूर गावातील अनेक नळ पाणीपुरवठा योजनेची कामे अर्धवट अवस्थेत आहेत.काही ठिकाणी पाईपलाइन टाकून काम थांबले आहे,तर काही ठिकाणी नळजोडणीच झाली नाही.त्यामुळे येत्या उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार असल्याची माहिती आहे. पाणीटंचाईमुळे अनेक महिलांना रोज डोक्यावर हंडे घेऊन दूरवर जावे लागत आहे.काही कुटुंबे विहिरींवर किंवा दूरच्या नळांवर अवलंबून आहेत.महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन असूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणे,ही गंभीर बाब आहे.निधी वेळेवर न मिळणे,ठेकेदारांची दिरंगाई, निकृष्ट दर्जाची कामे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे योजना रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.उद्घाटनांचे फोटो प्रसिद्ध होतात;मात्र नळातून पाणी येत नाही,अशी नाराजी नागरिकांमध्ये आहे. पालांदूर गावातील रखडलेल्या नळ पाणीपुरवठा कामांचा तातडीने आढावा घ्यावा,निधी उपलब्ध करून द्यावा,दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी आणि प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवावे,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. वर्षभर महिलांना डोक्यावर हंडा घ्यावा लागतो पालांदूर गावातील अनेक वार्डांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेची कामे अर्धवट अवस्थेत आहेत.कुठे पाइपलाइन टाकून ठेवण्यात आली आहे,तर कुठे नळजोडणीच अपूर्ण आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर' यंदाच्या उन्हाळ्यात तरी नळातून पाणी मिळणार का?'असा सवाल ग्रामस्थांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. गावातील पाणीटंचाई ही केवळ उन्हाळ्यापुरती मर्यादित नसून, अनेक वॉर्डांतील महिलांना वर्षभर डोक्यावर हंडे घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे भीषण वास्तव आहे. पाणी टंचाईपूर्वी दखल घेण्याची मागणी... उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जानेवारी महिन्याच्या शेवटीच पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवू लागले आहे.कित्येक नळांना तोट्याच नाहीत.त्याद्वारे पाणी वाया जात आहे.ते रोखण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करण्याची गरज आहे. आज अखेर झालेल्या ग्रामसभा, मासिक सभेच्या बैठकांतून वेळोवेळी वाया जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न सर्वसामान्य ग्रामस्थांसह विद्यमान सदस्यांनी अचूकपणे मांडला.मात्र तेवढ्यापुरतेच लक्ष दिले जाते. ठोस उपाययोजना केली जात नाही. सरपंचांनी याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे.
भारतीय संविधानाच्या बळावरच विविध भाषा, धर्म, जाती व संस्कृती असलेला भारत देश जगातील सर्वात मोठे व यशस्वी लोकशाही राष्ट्र म्हणून उभा आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही व्यवस्था टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण व संचलनासह मुख्य शासकीय समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीय, सैन्यदल, निमलष्करी व पोलीस दलांचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करत शपवार यांनी त्यांना भावपूर्ण वंदन केले. गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद-मराठवाडा मुक्ती संग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीरांचेही त्यांनी अभिवादन केले. देशाची एकता, अखंडता व सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पद्म तसेच शौर्य पुरस्कार विजेत्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केंद्र सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या शौर्य व सेवा पदक तसेच पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील मान्यवरांचा समावेश हा राज्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. पोलीस, अग्निशमन, होमगार्ड व सुधारात्मक सेवांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह कला, उद्योग, समाजसेवा, क्रीडा, वैद्यकीय व कृषी क्षेत्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांनी महाराष्ट्राची मान देशपातळीवर उंचावली असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यलढा व सामाजिक सुधारणांच्या चळवळीत पुण्याची भूमिका ऐतिहासिक व निर्णायक राहिल्याचेही त्यांनी सांगितले. शेती, उद्योग, व्यापार, सहकार, बँकिंग, आरोग्य व पायाभूत सुविधांच्या विकासात पुणे जिल्हा अग्रेसर असून आयटी हब, ऑटो हब आणि स्टार्टअप्सचे प्रमुख केंद्र म्हणून पुण्याची ओळख देश-विदेशातील तरुणांना आकर्षित करत असल्याचे पवार म्हणाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, अभिव्यक्ती व धार्मिक स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाची हमी दिल्यामुळे भारताची लोकशाही अधिक मजबूत झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवरच महाराष्ट्राची प्रगती उभी असून हेच विचार राज्याच्या व देशाच्या शाश्वत विकासाचा मंत्र असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. हे विचार सर्वांनी जपावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. भारतीय सैन्यदल, नौदल, वायुदल, निमलष्करी दल, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन दल यांच्या अतुलनीय सेवेचा त्यांनी गौरव केला. सीमेवरील त्याग, देशांतर्गत सुरक्षेसाठी केलेले बलिदान व आपत्तीच्या प्रसंगी दाखवलेली तत्परता प्रेरणादायी असल्याचे अजित पवारांनी नमूद केले. लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून संविधानाचे पालन, कायद्याचा आदर, सामाजिक सलोखा व विविधतेत एकता जोपासणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे युनिटचे उपअधीक्षक दयानंद सदाशिव गावडे, पोलीस निरीक्षक अविनाश रोकडेराव शिळीमकर, एसआरपीएफ गट क्रमांक–१ मधील सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप साहेबराव सानंतु, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक आयुक्त विठ्ठल खेहुली कुबडे, तसेच महेंद्र दामोदर कोरे, अमोल फडतरे आणि उपअधीक्षक अनंत माळी यांचा समावेश होता. ‘स्वच्छ पुणे संकल्प–2026’ प्रचार प्रसिद्धी रथास झेंडी पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छ पुणे संकल्प–2026 या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धी रथाला आज उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या त्रिसूत्रीवर आधारित स्वच्छ पुणे, सुंदर पुणे या संकल्पनेवर भर देण्यात आला. प्रचार रथाच्या माध्यमातून कचरा विलगीकरण, प्लास्टिकमुक्ती, स्वच्छता सवयी, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि नागरिकांची जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम,जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, पुणे पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री.विनय कुमार चौबे, पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. संदीपसिंह गिल, पुणे महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच स्वच्छता विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळला. यामुळे संतप्त झालेल्या एका महिला पोलिस अधिकाऱ्यांना महाजनांना जागेवरच जाब विचारला. यामुळे नाशिक येथील शासकीय ध्वजारोहणावेळी एकच वाद झाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. भारताने 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंगीकृत केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या संविधानाचे शिल्पकार मानले जातात. त्यामुळे साहजिकच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्याचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. पण गिरीश महाजन यांनी आपल्या संपूर्ण भाषणात एकदाही बाबासाहेबांचे नाव घेतले नाही. ते विसरले की त्यांनी ते जाणिवपूर्वक टाळले हे स्पष्ट झाले नाही. पण एका महिला पोलिस अधिकाऱ्याने या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. थेट पालकमंत्र्यांनाच विचारला जाब माधवी जाधव असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या सध्या वन विभागात कार्यरत आहेत. त्यांनी या प्रकरणी थेट मंत्री महाजनांना बाबासाहेबांचे नाव का घेतले नाही? असा जाब विचारला. या अनपेक्षित प्रकारामुळे महाजन चांगलेच भांबावले. त्यानंतर पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेऊन त्यांचे बोलणे बंद करण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी खूप मोठी चूक केली आहे. मला निलंबित केले तरी चालेल, पण मी त्यांना जाब विचारल्याप्रकरणी माफी मागणार नाही. काय म्हणाल्या माधवी जाधव? वादावादीनंतर पत्रकारांपुढे आपली बाजू मांडताना माधवी जाधव म्हणाल्या, गिरीश महाजनांनी आपल्या भाषणात कुठेही बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले नाही. जी व्यक्ती संविधानाला कारणीभूत आहे. त्याला तुम्ही संपवायला निघालात? पालकमंत्र्यांची ही फार मोठी चूक आहे. मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांनी ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी देणेघेणे नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन, माती काम करेन. पण मी बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला निलंबित करायचे असेल तर करू शकता. पण बाबासाहेबांना संपवायचे काम मी करू देणार नाही. मी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या तारखांना मानत नाही. पण लोकशाही मानते, असे त्या म्हणाल्या. संविधानाशी संबंध नसलेल्यांचे वारंवार नाव घेतले यावेळी अन्य एक महिला पोलिस अधिकारी माधवी जाधव यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यावेळी माधवी त्यांना म्हणाल्या, मॅडम तुम्ही देखील संविधानामुळे आहात. पालकमंत्रीही संविधानामुळे आहेत. बाबासाहेबांचे नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचे नाव एकदाही भाषणात आले नाही. लोकशाही व संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावे वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा व प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचे नाव भाषणात का आले नाही? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला.
राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, वेगवान आणि तंत्रस्नेही करण्यासाठी राबवण्यात आलेल्या '१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा' कार्यक्रमाचे निकाल आज प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आले आहेत. भारतीय गुणवत्ता परिषदेने (QCI) केलेल्या कडक मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक पोलिस आयुक्तालय आणि पनवेल महानगरपालिकेने आपापल्या संवर्गात बाजी मारली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वरून या विजेत्यांची यादी जाहीर करत त्यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वरून या विजेत्यांचे अभिनंदन केले. या सर्व कार्यालयांच्या प्रमुखांनी आणि त्यांच्या चमूने उल्लेखनीय काम केले आहे. राज्य शासनातर्फे या सर्व विजेत्यांचा लवकरच गौरव करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच, ग्रामीण भागातील प्रशासनाचे कणा असलेल्या उत्कृष्ट जिल्हा परिषदांची यादी येत्या ८ फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. ७ निकषांवर झाले मूल्यमापन केवळ वेबसाईट असणे पुरेसे नाही, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रशासनात कसा होतो, हे तपासण्यासाठी ७ महत्त्वाचे निकष लावण्यात आले होते. ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालये: भारतीय गुणवत्ता परिषदेने निवडलेली विविध संवर्गातील सर्वोत्कृष्ट कार्यालये खालीलप्रमाणे आहेत: हे ही वाचा… महाराष्ट्राची दुष्काळ मुक्तीकडे वाटचाल:शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणार - CM; सत्ता, संघर्ष, राजकारणाहून देश मोठा - एकनाथ शिंदे महाराष्ट्राची वाटचाल दुष्काळ मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. पुढील टप्प्यात सरकार शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त केले. आता महाराष्ट्र थांबणार नाही. आपल्या संविधानाने दिलेल्या व्यवस्थेच्या बलावर राज्य अधिक गतिमान व समृद्ध होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सविस्तर वाचा…
तिरंगा ही देशाची आन, बान व शान आहे. तिरंग्यासाठी आपल्या अनेक लोकांनी रक्त सांडले आहे. आज काही जातीयवादी व धर्मांध शक्ती स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील घराघरात मनामनात तिरंगा पोहोचवला पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केले. 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते मुंबई स्थित राज्य काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनात ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, सरचिटमीस प्रफुल्ल गुडदे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस जोजो थॉमस, झिशान अहमद, श्रुती म्हात्रे आदी नेते उपस्थित होते. एमआयएमच्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवा करण्याची घोषणा केली. त्यावर भाजपने आक्षेप घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांत राजकीय कलगीतुरा रंगला असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी उपरोक्त आवाहन केले. तिरंगा एक विचार, एक स्वप्न हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, स्वातंत्र्याचा लढा व स्वातंत्र्यानंतर देश उभारणीत काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. ही एक मोठी साधना आहे. या साधनेला संघर्षाची जोड आहे. संघर्षाचा हा मुलमंत्र आपण जपला पाहिजे. आज देशात काही शक्ती जातीपातीचे, धर्माचे राजकारण करत आहेत. कुणाला हिरव्या रंगाचे, तर कुणाला भगव्या रंगाचे राजकारण करायचे आहे. हिरवा व भगवा या रंगाचा आदर आहेच. कारण, हिरवा रंग हा सुबत्तेचा, तर भगवा रंग हा त्यागाचे व सन्मानाचे प्रतिक आहे. तिरंगा हा एक विचार आहे. स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही आजही रक्त सांडण्यास तयार आहोत. भाजप व एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहेत. मोहम्मद अली जिना यांच्या पक्षासोबत जनसंघाने निवडणुका लढवल्या. त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी उपमुख्यमंत्री होते. आज त्याचे पुनरुज्जीवन केले जात आहे, असे ते म्हणाले. मनामनात, घराघरात तिरंगा पोहोचवा तिरंगा हा आपल्या देशाची आन, बान व शान आहे. तिरंग्यासाठी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले बलिदान दिले आहे. पण सध्या काही जातीयवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी व संविधानवादी लोकांनी मात्र भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात मनामनात, घराघरात तिरंगा पोहोचवण्याचा निर्धार करावा, असेही सपकाळ यावेळी बोलताना म्हणाले.
भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने जिल्हा परिषद परिसरात एकच खळबळ उडाली. जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा धक्कादायक प्रकार घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.वेळेत पोलिसांनी जमेची बाजू घेतली. स्वावलंबी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका रत्नमाला मेंढे यांच्यावर झालेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ प्रदीप कांबळे यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पर्यवेक्षक पदाला मान्यता देऊन वेतन काढण्यासाची जबाबदारी होती.पण माझ्यावर अन्याय केला असल्याचा आरोप रत्नमाला मेंढे यांनी केला असून, याविरोधात गेल्या आठवडाभरापासून शिक्षण विभागासमोर आंदोलन सुरू होते. यापूर्वीही प्रशासनाला इशारा देण्यात आला होता, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे. पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले, मोठा अनर्थ टळला सोमवारी रोजी अचानक प्रदीप कांबळे यांनी अंगावर डिझेल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न करताच उपस्थित पोलिस व कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी कांबळे आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत कांबळे यांना ताब्यात घेतले व मोठा अनर्थ टळला. दोषींवर कारवाईची मागणी या घटनेनंतर जिल्हा परिषद परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, रत्नमाला मेंढे यांना न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहर पोलिस धाव घेतली आहे.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी MIM च्या नगरसेविका सहर शेख यांच्या मुंब्रा हिरवा करण्याच्या विधानावर अत्यंत परखड मत व्यक्त केले आहे. कोणताही रंग कुणाच्या बापाचा नाही. सगळे रंग हे निसर्गाच्या बापाचे आहेत, असे ते म्हणालेत. ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी 'कैसा हराया' म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चिडवले होते. यावेळी त्यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवे करण्याचीही घोषणा केली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर अखेर सहर शेखने पोलिसांकडे आपला माफीनामा लिहून देत या प्रकरणावर पडदा टाकला. या पार्श्वभूमीवर अभिनेते सयाजी शिंदे यांनी या प्रकरणावर वरील परखड प्रतिक्रिया दिली आहे. कुणाला आव आणून रंग तयार करता येत नाही सयाजी शिंदे सोमवारी जुन्नर तालुक्यात देवराईच्या कामानिमित्त आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, निसर्गामध्ये सगळे रंग आहेत. ते कुणाला आव आणून तयार करता येत नाहीत. कोणताही रंग कुणाच्या बापाचा नाही. सगळे रंग हे निसर्गाच्या बापाचे आहेत. महाराष्ट्रातील पहिली देवराई ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जुन्नर तालुक्यातून सुरू करत आहे. संताचे जे दुर्लक्षित विचार राहिले, ते आम्ही पुढे घेऊन जात आहोत. इथे सध्या 1 हजार झाडे लावण्यात आली आहे. आणखी 10 हजार झाडे आम्हाला इथे लावायची आहेत. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तपोवनाची जागा सोडून त्यांनी कुठेही कुंभमेळा करावा. कुंभमेळा ही सुद्धा चांगली परंपरा आहे. पण झाडांची परंपरा ही त्याहून अधिक चांगली आहे. मला राजकारणातील फारसे कळत नाही. त्यात मला रसही नाही. हजारो वर्षांपासून राजकारण सुरू आहे. ते आजही सुरूच आहे. त्यात काहीही नवीन नाही, असेही सयाजी शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. आता पाहू नेमका काय आहे वाद? सहर शेख ह्या ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झाल्या. त्यांचा विजय जेवढा लक्षवेधी ठरला, तेवढीच चर्चा त्यांनी विजयानंतर केलेल्या भाषणाचीही झाली. आपल्या भाषणात त्यांनी 'कैसा हराया' म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे सहर शेख हे नाव राज्यभर गाजले. त्यांचे वडील युनूस शेख हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मुंब्रा परिसरात सक्रिय होते. ते मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष म्हणूनही काम करत होते. त्यामुळे यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल असे सांगितले जात होते. जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांना तसा शब्द दिला होता. पण नंतर त्यांनी तो पाळला नाही. त्यामुळे सहर शेख यांनी एमआयएमकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांचा दणदणीत विजय झाला. पण त्यानंतर झालेल्या विजयी सभेत त्यांनी आव्हाड यांच्यावर टीका केल्यामुळे त्या स्वतःच टीकेच्या धनी बनल्या.
केंद्र सरकारने मानधन वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी सुरू केलेल्या एसएनए (सिंगल नोडल एजन्सी) या नव्या प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील सुमारे १ लाख १४ हजार अंगणवाडी सेविकांचे डिसेंबर महिन्यापासून मानधन थकल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांना केंद्र सरकार व राज्य शासनाकडून एकत्रित मानधन दिले जाते. मात्र या प्रक्रियेत सुसूत्रता यावी, यासाठी केंद्र सरकारने एसएनए ही नवी प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीअंतर्गत आधार लिंक करणे, बँक खात्यांचे व्हेरिफिकेशन तसेच नावातील तफावत दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तथापि, प्रणालीतील सर्व्हर त्रुटी आणि तांत्रिक अडचणींमुळे ही कामे अत्यंत धीम्या गतीने होत असल्याने सेविकांचे मानधन रखडले आहे. त्यामुळे त्यांना घरखर्च सांभाळणे कठीण झाले आहे. एसएनए प्रणालीमुळे पारदर्शकता वाढली असली, तरी तांत्रिक अडचणींमुळे सेविकांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने थकित मानधन तत्काळ जमा करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सेविकांनी दिला आहे. चर्चेसाठी मंत्र्यांना मिळेना वेळ अंगणवाडी सेविकांचे मानधन पूर्वी पीएफएम प्रणालीद्वारे दिले जात होते. केंद्र सरकारने ती प्रणाली बंद करून, नवीन एसएनए प्रणालीद्वारे मानधन देण्याची सूचना केल्यामुळे राज्यातील एक लाख १४ हजार अंगणवाडी सेविकांना डिसेंबरपासून मानधन मिळालेले नाही. निवडणूक जिंकण्यासाठी लाडक्या बहिणींना मतदानापूर्वी पैसे दिले जातात, पण लाभार्थींना योजनेचे फायदे देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे वेळ नाही. - राजेश सिंग, संघटक सचिव, अंगणवाडी कर्मचारी संघटना तक्रारी करूनही मिळेना मानधन दरमहा मिळणाऱ्या मानधनावर आमचे कुटुंब चालते. महागाई वाढलेली असताना दोन-दोन महिने पैसे न मिळाल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही मानधन मिळत नाही. संबंधित विभागाने याबाबत लवकर त्रृटी दूर करून मानधन द्यावे. - गायत्री देसले, अंगणवाडी सेविका आठ दिवसांत मानधन जमा होईल टेक्निकल अडचण आहे. त्यामुळे मानधन रखडले आहे आठ दिवसांत मानधन जमा होतील. - सोमनाथ काकडे, लेखाधिकारी, आयुक्तालय
राजस्थान सरकारने ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर विद्यमान निवर्तमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. असे असताना महाराष्ट्र सरकार मात्र लोकनियुक्त सरपंचांना डावलून शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याच्या दिशेने जात असल्याचा आरोप सरपंच संघटनांनी केला आहे. राजस्थानच्या ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाने १६ जानेवारी २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ ३१ जानेवारी २०२५ पर्यंत संपत आहे आणि अपरिहार्य कारणांमुळे निवडणुका होऊ शकत नाहीत, त्या ग्रामपंचायतींमध्ये निवर्तमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच उपसरपंच व वार्डपंचांचा समावेश असलेली प्रशासकीय समिती स्थापन करून गावाचा कारभार लोकप्रतिनिधींच्याच मार्गदर्शनाखाली सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याऊलट महाराष्ट्रात मात्र १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत संपुष्टात येणाऱ्या ग्रामपंचायतींवर सरपंचांना डावलून ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि विस्तार अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नेमले जाणार आहे. अमरावती जिल्ह्यात अशा ५५० ग्रामपंचायती आहेत. दरम्यान शासनाच्या ताज्या निर्णयामुळे लोकशाही धोक्यात आली असून ग्रामस्वराज्य आणि ग्रामीण विकासावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके आणि प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “राजस्थान सरकार लोकनियुक्त सरपंचांवर विश्वास ठेवते, मग महाराष्ट्र सरकारला लोकप्रतिनिधींवर विश्वास का नाही ? हा लोकशाहीविरोधी आणि ग्रामस्वराज्याला कमजोर करणारा निर्णय आहे.”, असे त्यांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते, राजस्थान सरकारचा निर्णय लोकशाही, विकेंद्रीकरण आणि ग्रामस्वराज्य मजबूत करणारा असून, तो महाराष्ट्रासाठीही आदर्श ठरू शकतो. यामुळे आता संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यभर आंदोलनाचा संघटनेने दिला इशारा संघटनेने महाराष्ट्र सरकारकडे राजस्थानप्रमाणेच धोरण स्वीकारण्याची ठाम मागणी केली आहे. दरम्यानच्या काळात जर लोकनियुक्त सरपंचांना प्रशासक म्हणून मान्यता दिली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. “राजस्थानमध्ये जे शक्य आहे, ते महाराष्ट्रात अशक्य का ? लोकशाहीचा मान राखा, ग्रामस्वराज्य वाचवा,” अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.
महाराष्ट्राची वाटचाल दुष्काळ मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. पुढील टप्प्यात सरकार शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त केले. आता महाराष्ट्र थांबणार नाही. आपल्या संविधानाने दिलेल्या व्यवस्थेच्या बलावर राज्य अधिक गतिमान व समृद्ध होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, भारताने 26 जानेवारी 1950 रोजी संविधान स्वीकारून लोकशाही प्रजासत्ताकाची पायाभरणी केली. आपल्याला जगातील सर्वोत्तम संविधान लाभले. त्यामुळे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान निर्मिती समितीला मानवंदना अर्पण करतो. देशाची प्रगती ही स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांवर उभी आहे. आता महाराष्ट्र थांबणार नाही. आपल्या संविधानाने दिलेल्या व्यवस्थेच्या बलावर राज्य अधिक गतिमान व समृद्ध होईल. विकासाच्या प्रक्रियेत सर्वच घटक सहभागी ते पुढे म्हणाले, भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. महाराष्ट्राचे देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून काम करत आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. दावोस येथे सुमारे 30 लाख कोटींचे करार झाले. यामुळे राज्यातील सर्वच घटक विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होत असल्याचे स्पष्ट होते. यामुळे रोजगार निर्मितीलाही चालना मिळते. शेतकरी हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे नमूद करत फडणवीस म्हणाले, शेतीला पाणी, वीज व बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सातत्याने धोरणात्मक निर्णय घेत आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने जलसंधारण, सिंचन व पाणी व्यवस्थापनावर भर देण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून, एमएमआरडीएच्या माध्यमातून विविध महत्त्वाचे प्रकल्प राबवले जात आहेत. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येत आहेत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात असून, सर्वसामान्यांना निवाऱ्याचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिलांसाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी विविध कृषी उपक्रम, तसेच मोफत वीज योजनेसारख्या निर्णयांद्वारे समाजातील विविध घटकांचा सर्वांगिन विकास साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. सत्ता, संघर्षापेक्षा देश मोठा - एकनाथ शिंदे दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्ता, संघर्षाच्या राजकारणापेक्षा देश मोठा असतो असे नमूद करत संविधानामुळेच प्रत्येक नागरिकाला न्याय व स्वातंत्र्य मिळाल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले, विकास हाच आमच्या सरकारचा मुख्य अजेंडा आहे. मराठी माणसाची ताकद केवळ मुंबईपुरती मर्यादित नाही. चाद्यापासून बांद्यापर्यंत मराठी माणसांचे साम्राज्य आहे. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही. पण राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न करतो. सरकार राज्याच्या सर्वांगिन विकासासाठी कटिबद्ध आहे. निवडणुकीत मायबाप जनतेने भावनेचे राजकारण करण्यांऐवजी विकासाला प्राधान्य देणाऱ्यांना सत्ता दिली. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. दावोस येथील 30 लाख कोटींच्या करारामुळे राज्यात 40 लाख रोजगार निर्मिती होईल. राज्यातील शहरे झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर दिला जाईल. लवकरच मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असेही उपमुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.
मनपा निवडणूकीत भाजपला सर्वाधिक २५ जागा मिळाल्या आहे, तरीही २०१७ च्या तुलनेत २० जागांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात शनिवारी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोअर कमिटीसोबत दोन ते अडीच तास मंथन केले. यावेळी पराभवाचे काही कारणं त्यांच्या समोर आलेले आहेत. दरम्यान पराभवाची आणखी कारणं जाणून घेण्यासाठी भाजपची राज्यस्तरीय समिती लवकरच शहरात येणार असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. येथील शासकिय विश्राम भवनावर आमदार प्रताप अडसड, आमदार उमेश यावलकर, आमदार प्रविण तायडे, आमदार राजेश वानखडे, शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, माजी मंत्री प्रविण पोटे, माजी खासदार नवनित राणा, किरणताई महल्ले, जयंत डेहनकर, प्रा. रविन्द्र खांडेकर, प्रा. दिनेश सुर्यवंशी, किरण पातुरकर आदी सदस्यांसोबत पालकमंत्री बावनकुळे यांनी बैठक घेतली. नाराजीमुळेच ४ ते ५ जागांचे नुकसान निश्चितच झाले एक जागेवर एकाच उमेदवाराला उमेदवारी देऊ शकतो. असे काही व्यक्ती होते कि, त्यांना उमेदवारी द्यायची मनातून ईच्छा असूनही देऊ शकलो नाही. मात्र पक्षाने तिकीट दिली नाही म्हणून इतर पक्षात जाणे किंवा पक्षविरोधी काम करणे योग्य नाही. अशा नाराजांमुळे आम्हाला निश्चितच ४ ते ५ जागांचे या ठिकाणी नुकसान झाले आहे. तसेच आमचे आठ ते नऊ उमेदवार हे दोनशे मतांच्या फरकाने पराभुत झाले असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. गट नेतेपदी महिलेला संधी! अशावेळी गटनेता म्हणून महिलेची सुध्दा वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजपच्या महिला नगरसेविकांची संख्या अधिक असल्यामुळे महापौर महिलाच करण्यात यावी, अशीही एक मागणी पालक मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. तूर्तास गटनेत्याबाबत २६ जानेवारीपर्यंत निर्णय घेऊ आणि त्यापुढील दोन ते तीन दिवसात कोअर कमिटीचे मत विचारात घेऊन पार्लमेंटरी बोर्ड नाव ठरवेल.
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्धनपंत बोथे यांना पद्मश्री पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात शनिवारी (दि. २५) जाहीर झाला आहे. पद्मश्री हा भारतातील चौथ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. भारत सरकारकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार दिला जातो. बोथे यांना ‘समाजसेवा’ क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. जनार्दन बापुराव बोथे (८८) हे गुरुकुंज मोझरी येथील रहिवासी असून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे स्वीय सहायक, छायाचित्रकार म्हणून कार्यरत होते. त्यांनी सुमारे १६ वर्ष तुकडोजी महाराजांसोबत काम केले आहे. १९५२ मध्ये जनार्दन बोथे हे अवघ्या बारा वर्षांचे होते, त्यावेळी महाराजांनी त्यांना आपल्या सोबत आणले होते. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने सद्या दोन निवासी आश्रमशाळा, पाच शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, एक आयुर्वेदिक महाविद्यालय, डीएड महाविद्यालय, वृध्दाश्रम, गौरक्षण, विद्यार्थी वसतीगृह सुरू आहेत. अ. भा. श्री. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून या शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य सुरू आहे. जनार्धनपंत बोथे सांगतात, मी अवघ्या बारा वर्षांचा होता. वाशीम जिल्ह्यातील गोगरी हे माझे मुळ गाव. १९५२ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आमच्या गावात आले होते. त्यावेळी मला सोबत द्यावे, असे माझ्या वडीलांना महाराज म्हणाले होते. वडीलांनी सुध्दा होकार दिला. मला त्यावेळी महाराजांबद्दल फार माहीती नव्हती. मात्र महाराजांकडे त्यावेळी चारचाकी गाडी होती. त्या गाडीला डाव्या बाजूने स्टेअरिंग होते. त्या काळात वाहन पाहायला मिळणे हीच अतिशय दुर्मिळ बाब होती. मात्र मला तर महाराज सोबत आणणार असल्यामुळे त्या चारचाकीत बसायला मिळणार होते. त्या वाहनाला पाहून मी प्रचंड खुष झालो आणि महाराजांसोबत आलो. त्यानंतर पूर्णवेळ महाराजांसोबत राहीलो, गुरूकुंजातच शिक्षण घेतले. त्यानंतर महाराजांनी १९६५ साली जपानवरुन कॅमेरा आणला. छायाचित्रण शिकलो व त्यानंतर महाराजांचे छायाचित्र सुध्दा काढत होतो. महाराजांच्या आशिर्वादाने समाजसेवेचे काम अजूनही सुरूच आहे. हा पद्मश्री पुरस्कार निश्चितच प्रचंड आनंद देणारा आहे. या पुरस्कारासाठी नाव माझे असले तरीही हा पुरस्कार संपुर्ण श्री गुरुदेव भक्तांचा आहे. जिल्ह्याच्या शिरपेचात सहावा पद्मश्री पुरस्काराचा बहुमान जिल्ह्यात यापुर्वी पद्मश्री पुरस्काराने तपावेनचे संस्थापक दाजीसाहेब पटवर्धन, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, नैसर्गीक शेतीतील योगदानासाठी सुभाष पाळेकर, आदिवासी बांधवामध्ये राहून अख्खे आयुष्य समाजसेवेत घालवणारे डॉ. स्मिता व डॉ. रविन्द्र कोल्हे आणि २०२४ मध्ये १३१ अनाथ, दिव्यांग मुलांचे पालकत्व स्वीकारणारे शंकर बाबा पापळकर यांना पद्मश्री देऊन भारत सरकारने यापुर्वी सन्मानित केले आहे. जनार्दन बोथे यांच्या रुपाने जिल्ह्यात सहावा पद्मश्री सन्मान प्राप्त झाला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ४०९ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विविध कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या कामांमुळे ग्रामीण भागातील १३ हजार १८३ मजुरांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. त्यामुळे मनरेगा योजना सध्या ग्रामीण मजुरांसाठी मोठा आधार ठरत असल्याचे चित्र आहे. जॉब कार्डधारक मजुरांना संबंधित ग्रामपंचायतीमार्फत गावात किंवा गावालगत रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे कामाच्या शोधात गाव सोडून जाण्याची वेळ मजुरांवर आलेली नाही. मनरेगाअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना प्रतिदिन ३१२ रुपये मजुरी दिली जात आहे. २००८ पासून केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त माध्यमातून मनरेगा योजना देशभर राबवण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील हजारो जॉब कार्डधारक नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. जॉब कार्ड असलेल्या व्यक्तीने मागणी केल्यास संबंधित ग्रामपंचायतीने वर्षातून किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. सार्वजनिक कामांवरील मजुरांची हजेरी ऑनलाइन, तर इतर कामांवरील हजेरी ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते. ग्रामरोजगार सेवकांवर मस्टरची जबाबदारी मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची दररोज हजेरी घेणे, सात दिवसांचे मस्टर तयार करून ते संबंधित पंचायत समितीकडे सादर करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सहायकांवर असते. शासनाकडून त्यांना मोबदला दिला जात असला तरी निधीअभावी हा मोबदला वेळेवर मिळत नसल्याने अनेक ग्रामरोजगार सेवकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तालुकानिहाय मजुरांची संख्या २३ जानेवारी रोजीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील मनरेगावरील एकूण मजुरांची संख्या १३,१८३ इतकी आहे. या योजनेमुळे ग्रामीण मजुरांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात एकूण ८८९ ग्रामपंचायती असून, त्यापैकी २३ जानेवारी रोजी केवळ ४०९ ग्रामपंचा यतींमध्ये मनरेगाची कामे सुरू आहेत. यात बुलडाणा ६, चिखली ८०, देऊळगावराजा २४, जळगाव जामोद २०, खामगाव ५२, लोणार २५, मलकापूर ३५, मेहकर ५४, मोताळा २, नांदुरा ५१, संग्रामपूर ३१, शेगाव ९, सिंदखेडराजा २०. यामध्ये सर्वाधिक कामे चिखली तालुक्यात, तर सर्वात कमी कामे मोताळा तालुक्यात सुरू आहेत. जिल्ह्यात तालुकानिहाय मजूर संख्या पुढीलप्रमाणे बुलडाणा ७२, चिखली २,९३९, देऊळगावराजा ३०१, जळगाव जामोद ९९८, खामगाव १,२६२, लोणार ७२२, मलकापूर ९९९, मेहकर २,०२५, मोताळा ११४, नांदुरा १,५९१, संग्रामपूर १,२५२, शेगाव २७६, सिंदखेडराजा ६३२.
महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक १३ सदस्यांनी ४६ उमेदवारी अर्ज घेतले. यात महापौर पदासाठी भाजपच्या चार तर शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका आेबीसी महिला प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, शारदा रणजीत खेडकर, वैशाली विलास शेळके,अॅड कल्पना संजय गोटफोडे आणि योगीता गणेश पावसाळे या चार ‘लाडक्या बहिणीं’चे उमेदवारी अर्ज भाजप पक्षश्रेष्ठींकडे सादर झाले असून, यापैकी महापौर पदाचा उमेदवार म्हणून कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे अकोलावासीयांचे लक्ष लागून आहे. काँग्रेसतर्फे निखत शाहीन अफसर अहमद कुरेशी, शिवसेनेतर्फे (उबाठा) सुरेखा मंगेश काळे यांनी महापौरपदासाठी अर्जांची उचल केली. २६ जानेवारीला सकाळी ११ ते ५ या वेळात महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. रविवारी भाजप, शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महापौर पदासाठी ६ सदस्यांनी २० उमेदवारी अर्जाची उचल केली तर उपमहापौर पदासाठी भाजप, शिवसेना (उबाठा) आणि वंचित या तीन पक्षांचे मिळून ७ सदस्यांनी २६ उमेदवारी अर्जांची उचल केली. २६ जानेवारीला उर्वरित पान ४ सदस्यांचे नाव पद अर्ज संख्या पक्ष {शारदा खेडकर महापौर ४ भाजप {वैशाली शेळके महापौर ४ भाजप {योगीता पावसाळे महापौर ४ भाजप {अॅड. कल्पना गोटफोडे महापौर ४ भाजप {सुरेखा काळे महापौर २ शिवसेना (उबाठा) {निखत शाहीन कुरेशी महापौर २ काँग्रेस {नितीन ताकवाले उपमहापौर ४ भाजप {धनंजय धबाले उपमहापौर ४ भाजप {अमोल मोहोकार उपमहापौर ४ भाजप {अमोल गोगे उपमहापौर ४ भाजप {विजय इंगळे उपमहापौर ४ शिवसेना (उबाठा) {सागर भारुका उपमहापौर २ शिवसेना (उबाठा) {पराग गवई उपमहापौर ४ वंचित एकाच्या नावे उचल दुसरा उमेदवार भरू शकतो अर्ज महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्जाची ज्या उमेदवाराच्या नावाने उचल केली त्याच उमेदवाराने तो अर्ज भरावा, असे बंधनकारक नाही. काही पक्षाच्य उमेदवारांनी प्रत्येकी दोन ते चार उमेदवारी अर्जाची उचल केली असल्याने ते आपल्या पक्षातील इतर उमेदवारांसाठी तो अर्ज वापरू शकतात. त्यामुळे ज्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी महापौर, उपमहापौर पदासाठी अर्जांची आज रविवारी उचल केली तेच उद्या सोमवारी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरतील, असे नाही. परिणामी पक्षातर्फे ऐनवेळी कुणीही सदस्य उमेदवारी अर्ज दाखल करू शकेल, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्यारणधुमाळीत एबी फॉर्म वाटपामुळे भाजपमधील अंतर्गतसंघर्ष एका टोकालाच गेला आहे. उमेदवारांच्या यादीवरपालकमंत्री जयकुमार गोरे यांचेच वर्चस्व दिसत आहे.भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यात चांगलाच जम बसवलाआहे. गेली २ ते ३ महिन्यांपासून पक्षात चांगलेच इनकमिंगसुरू आहे. त्यामुळे निवडणुकीत उमेदवारी देताना प्रमुखांनाअनेक अडचणींना, रोषाला सामोरे जावे लागले. त्यामध्येपक्षात नवीन आलेल्यांना उमेदवारी देणे गरजेचे असतानाजुने कार्यकर्ते मात्र नाराज झाले आहेत. तर जिल्ह्यातभाजपात नव्याने आलेल्या १८ आयारामांना संधी दिली. माळशिरसमध्ये माजी आमदार राम सातपुते, मंगळवेढ्यातआमदार समाधान आवताडे, पंढरपुरात भाजप नेते प्रशांतपरिचारक, मोहोळमध्ये माजी आमदार राजन पाटील,दक्षिणमध्ये आमदार सुभाष देशमुख तर उत्तरमध्ये माजीआमदार दिलीप माने यांनी सुत्रे हलवली.विशेष म्हणजेअधिकृत उमेदवारी मिळालेल्यांना ही नाराजांच्या मेळाव्यालाहजेरी लावली. पंढरपूर तालुक्यात तिघांना उमेदवारी पंढरपूर तालुक्यात तिघांना उमेदवारी दिली. करकंबगटामधून राष्ट्रवादीतून आदिनाथ देशमुख यांना भाजपनेउमेदवारी दिली. तर भोपे इथून राष्ट्रवादीचे प्रफुल्लतापाटील यांना भाजपने तिकीट दिले. वाखरी जिल्हा परिषदगटातून राष्ट्रवादीचे मोनिका समाधान काळे यांनाभाजपने उमेदवारी दिली. मंगळवेढ्यात दोघांना उमेदवारी हुलजंती गटातून भाजपाचे संगीता दुधाळयांना उमेदवारी देण्यात आली. याठिकाणाहून इच्छुक प्रदीप खांडेकर यांनाभोसे गटात निवडणूक लढवावी लागली.काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष कवचाळेयांना ऐनवेळी भाजपने उमेदवारी दिली. मोहोळमध्ये ३ उमेदवारी मोहोळ जिल्हा परिषद, पंचायत समितीनिवडणूकीत भाजप पक्षात नवीनआलेल्या उबाठाचे लखन शिंदे नरखेडयांना उमेदवारी देण्यात आली तरजगन्नाथ कोल्हाळ यांना थांबण्याची वेळआली.नव्यानेच राजकारणात सचिनजाधव यांना उमेदवारी दिली. अकलूजमध्ये तिघांना उमेदवारी अकलूजमध्ये जिल्हा परिषद व पंचायतसमितीच्या निवडणुकीसाठी पक्षात नवीनआलेल्या अमृतराज माने देशमुख, वेळापूरपंचायत समिती गण,तसेच राजेश्वरी मानेदेशमुख यांना संग्रामनगर पंचायत समितीगण तर चंद्रकांत जाधव यांना पिलीव जिल्हापरिषद गटातून भाजपने उमेदवारी दिली. माढ्यात चौघांना उमेदवारी दिली मानेगांव जिल्हा परिषद गटामध्ये सुहासपाटील जामगांवकर यांना डावलून पृथ्वीराजसावंत यांना उमेदवारी. टेंभूर्णी जिल्हा परिषदगटातून अंजनादेवी पाटील चांदजकर यांनाडावलून अमृता वाघे यांना उमेदवारीदिली.भोसरेत गटात शुभांगी उबाळे यांनाडावलून अश्विनी दळवे यांना उमेदवारी. दक्षिणमध्ये दोघांना उमेदवारी बोरामणी जिल्हा परिषद गटात भाजपचेनिष्ठावान सिद्धाराम हेले डावलून नेताजीखंडागळे यांना भाजपकडून उमेदवारीदेण्यात आली आहे. हत्तुर गणामध्येभाजपचे प्रशांत सलगरे यांना वगळूनपंचाप्पा धनशेट्टी यांना उमेदवारी दिली. उत्तरमध्ये एकाला संधी माजी आमदार दिलीपराव माने यांच्याभाजप पक्षात झालेल्या प्रवेशामुळेनान्नज गटातील राजकीय समीकरणेबदलली. माजी आमदार दिलीपराव मानेयांचे निकटवर्तीय श्रीकांत मुळे यांनाभाजपकडून अधिकृत उमेदवारी दिली. बंडखोरी शांत केल्यानंतरही अस्वस्थता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वपक्षांचा भर नुकसान टाळणे हाच आहे. बंडखोरीरोखण्यासाठी केवळ राजकीय नव्हे तर भावनिक आणिव्यक्तिगत पातळीवरही प्रयत्न झाले. अनेक ठिकाणीवरिष्ठ नेत्यांचे फोन, प्रत्यक्ष भेटी मध्यस्थी आणिआश्वासनांचे राजकारण पाहायला मिळाले. बंडखोरीरोखण्यात यश आले असले तरी काही तालुक्यात मात्रअजूनही अस्वस्थता कायम आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. भाजपने परवानगी दिली तर मी यांचे नामोनिशाण मिटवून टाकेन. आज पुन्हा मी हे बोलत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजप व शिंदे गटातील कथित वाद पुन्हा एकदा टोकाला पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीवेळी मुंबईत गणेश नाईक व शिंदे गटात मोठा राजकीय कलगीतुरा रंगला होता. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हा कलगीतुरा संपण्याची शक्यता होती. पण आता भाजप नेते तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्या वरील विधानामुळे हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत. ते सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, भाजपने परवानगी दिली तर मी यांचे नामोनिशाण मिटवून टाकेन. मी आज हे पुन्हा बोलत आहे. भाजप हा शिस्त पाळणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाने आदेश दिला म्हणून मी ते मान्य केले. मनाला पटले नसले तरी कार्यकर्त्यांनी ते शांतपणे सहन केले. पक्ष नेतृत्वाचा निर्णय आम्ही मान्य केला. एकेकाळी मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) महायुतीमधील सर्व कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे लढू द्यावे. निवडणुकीनंतर ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून येतील त्यांना मित्र पक्षांनी पाठिंबा द्यावा व उर्वरित पदांची वाटणी करावी असे माझे मत होते. मी ही बाब मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घातली होती. त्यांनी त्यावर होकार दिला नाही आणि नकारही दिला नाही. आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा आम्हाला होती. पण काही ठिकाणी ती संधी मिळालीच नाही, असे ते म्हणाले. ठाण्यात भाजपने आपल्या घोड्यांचे लगाम खेचले गणेश नाईक पुढे म्हणाले, नवी मुंबईत शिंदे गटाकडून 57 जागांची मागणी करण्यात आली. पण आमची त्यांना 20 ते 22 जागा देण्याची तयारी होती. शेवटच्या दिवसापर्यंत चर्चेच्या फैऱ्या सुरू होत्या. अखेर त्यांनी एबी फॉर्म भरले. त्यानंतर आम्हीही भरले. त्यानंतर जे झाले ते चांगलेच झाले. ठाण्यातील लोकांना काही करामत करता आली नाही. ठाण्यात भाजपच्या घोड्यांचे लगाम खेचले गेले. कल्याणमध्येही तेच झाले. त्यानंतरही पक्षाला जे मान्य होते तेच आम्ही मान्य केले. हे मी बोलणार नाही तर कोण बोलणार? भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. एकदा आदेश दिला की, तिथे इतर काही येत नाही. हे मी बोलणार नाही तर कोण बोलणार? त्यानंतरही कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त पाळली. हे कौतुकास्पद आहे. सगळ्या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढली असती आणि ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून आले त्यांना महापौर पदासह इतर प्रमुख पदे मिळाली असती. पण हे माझे पूर्णपणे वैयक्तिक मत आहे, असेही गणेश नाईक यावेळी बोलताना म्हणाले.
भाजप हा नेता चोरणारा पक्ष आहे. शिवसेना नेता घडवणारी पार्टी आहे. सोलापुरात १०२ पैकी भाजपचे ८७नगरसेवक निवडून आले. याचे श्रेय पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देण्याचे कारणच नाही. हे यश म्हणजे भाजपच्या कूटनीती, कपटनीतीचा करिष्मा आहे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या तथा सोलापूर संपर्क प्रमुख सुषमा अंधारे यांनी लगावला. श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सोलापूर जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्या प्रथमच सोलापुरात आल्या होत्या. त्या म्हणाल्या, आम्ही सभागृहात कमी संख्येत असलो तरी आमचा वचक असणार. सध्या कठीण प्रसंग आहे. आमचा कार्यकर्ता खचणारा नाही. भाजपकडे पैसे भरपूर आहेत, तो ईडीला कधी दिसत नाही. तो पैसा आज जोर करतोय. ईडीला समोर करून दबाव आणला जात आहे. क्लिन चिट मिळाल्यानंतर भाजप विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणारे संजय राऊत एकमेव नेते आहेत. मी महिला असल्याचा व्हिक्टिम कार्ड कधीच वापरत नाही. बाई समजून मला कोणी हलक्यात घेऊ नये. अन्यथा अडचण होई शकते, असा इशारा अंधारे यांनी दिला. आघाडीची महिन्यातून एकदा आढावा बैठक पुढील निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडीचे एकत्रितपणे नियोजन करून पावले उचलू. नियोजन करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची महिन्यातून एकदा आढावा बैठक घेऊ. सुसंवाद घडवू, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेऊन सोडवू. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हातात हात देऊन लढा देऊ, अशा शब्दात अंधारे यांनी मार्गदर्शन केले. मतभेद विसरू.. एकदिलाने राहू आपल्याला महाविकास आघाडी मजबूत करायची असेल तर एकदिलाने राहावे लागेल. आपसातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. एकत्र येऊन भविष्य घडवू, असे मार्गदर्शन सुषमा अंधारे यांनी केले. हॉटेल सिटी पार्क येथे महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना अंधारे म्हणाल्या, महापालिका निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पक्षात बंडखोरी झालीच. यापुढे कधीही बंडखोरी होऊ नये म्हणून प्रयत्न करु. प्रयत्न करूनसुद्धा बंडखोरी झाली तर बंडखोरांवर कडक कारवाई करु. यावेळी शिवसेनेचे अजय दासरी, राष्ट्रवादीचे महेश गादेकर, शंकर पाटील, चंद्रकांत पवार, काँग्रेसचे नरसिंग आसादे, आरिफ शेख, बाबा मिस्त्री, रियाज हुंडेकरी उपस्थित होते. इम्तियाज जलील प्रकरण-हा स्क्रिप्टेड गेम : सुषमा अंधारे जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.बार्शीची युती ही आमची युती नाही.भाजप 'वापरते आणि फेकून देते'धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणापासून ते संजय सिरसाट यांच्यावरील एसआयटी चौकशीपर्यंत एकामागोमाग एक प्रकरणे बाहेर येत आहेत.इम्तियाज जलील प्रकरण-हा स्क्रिप्टेड गेम आहे. मला यावर बोलायचे नाही.निवडणूक बिनविरोध होतात, कारण पैसा बोलतो
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्तेची गणिते जुळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपल्या हक्काच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात' उमेदवारांना झुकते माप दिले आहे. पक्षासाठी वर्षानुवर्षे घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी ऐनवेळी पक्षात आलेल्यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला असून अनेक ठिकाणी बंडाचे निशाण फडकवण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता एक दिवस शिल्लक असताना, या बंडखोरांचे बंड थंड करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून आश्वासनांची खैरात केली जात आहे. मात्र, मनधरणी करण्यात यश आले तरी निवडणुकीच्या मैदानात हे दुखावलेले निष्ठावंत मनापासून पक्षाचे काम करतील का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.या नाराजीमुळे अनेक इच्छुकांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. आता या नाराजांची मनधरणी करण्यात नेत्यांना कितपत यश येते आणि निवडणुकीच्या निकालावर याचे काय परिणाम होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. जिल्हा परिषदेच्या एका गटात सरासरी १० ते १२ गावांचा समावेश असतो. या भागातील दांडगा जनसंपर्क असलेल्या स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. मात्र, विजय मिळवण्याच्या ईर्ष्येपोटी दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवारांना उमेदवारीची माळ घालण्यात आली. पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी या निवडणुका महत्त्वाच्या असतात, तिथेच आमचा बळी दिला जात असेल तर पक्षवाढ कशी होणार?असा संतप्त सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. महानगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसने औसा तालुक्यातील दोन गटात आयातांना संधी दिली आहे. निष्ठावंतांना डावलत आयातांना दिलेल्या उमेदवारीची चांगलीच चर्चा होवू लागली आहे. मातोळा गटातील शालिनी चव्हाण यांना लामजना गटातून उमेदवारी दिली आहे. तर खरोसा गटात मंगरुळ येथील रहिवासी सचिन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नेत्यांच्या मुलांना उमेदवारी दिली जाणार नसल्याचे भाजपने जाहीर केले होते. त्यापूर्वीच आ. रमेश कराड यांचे चिरंजीव ऋषिकेश कराड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या उमेदवारीवरून चर्चा सुरु असतानाच ऋषिकेश कराड यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २७ जानेवारी रोजी ते उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. दुसरा उमेदवार देवून त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू सोळुंके यांना दापका, अंबुलगा गटात तयारी लागण्याचे आदेश देवून डावलले. माजी समाजकल्याण सभापती संजय दोरवे यांना अर्ज भरल्यानंतर ही डावलण्यात आले. अंबुलगा गटातून गुंडेराव जाधव, प्रसाद जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. पक्षातील निष्ठावंतांना डावलून भाजपने धक्कातंत्राचा केलेला वापर कोणाला धक्का देणारा ठरतो हे येणारा काळच सांगणार आहे. निलंग्यात भाजपचे धक्कातंत्र निष्ठावंतांना डावलून इतरांना उमेदवारी दिल्याचा क्रम उदगीर तालुक्यातही भाजपने कायम ठेवला. भाजपमधील सात निष्ठावंतांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान मनधरणी करण्यात कितपत यश येईल हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे. दरम्यान वेगवेगळ्या माध्यमातून या उमेदवारांचे बंड क्षमविण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात उमटत आहे.
अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणूक:आरक्षणाच्या मुद्द्यावर पेच, इच्छुकांचा उत्साह मावळला
अहिल्यानगर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गट व गणरचना तसेच आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. परंतू, आरक्षणाच्या मुद्द्यावर पेच निर्माण झाला. त्यामुळे निवडणुकांचा बिगूल अद्याप वाजलेला नाही. त्यामुळे महिनाभरापूर्वी ज्या जोशात, इच्छुकांनी तयारी सुरू केली होती, त्यांचा उत्साह आता मावळलेला दिसतो आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक होईल, असा तर्क लावला जात आहे. परंतू, घोषणा झाल्यानंतरच अधिकृत तारीख जाहीर होईल. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत २१ जानेवारी रोजीही अंतिम निर्णय स्पष्ट नाही. ज्या जिल्ह्यांत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यावर गेली, त्याबाबतचा निकाल या सुनावणीत अपेक्षित होता. मात्र, अद्याप स्पष्ट झाले नाही. १२ जानेवारीच्या सुनावणीत आयोगाने १० ते १५ दिवसांची मुदतवाढ मागितली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत निवडणुका पूर्ण करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढवून दिली होती. जिथे पेच नाही तिथे निवडणूक' यावर शिक्कामोर्तब झाला असून, प्रक्रिया सुरू झाली. अकोले व श्रीरामपूर पंचायत समितींमधील आरक्षण ५० टक्क्यांवर जात आहे. यापार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडली आहे. जगन्नाथ भोर, निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती निवडणूक का महत्त्वाची आहे? जि.प.बरोबर पंचायत समिती निवडणूक होणे आवश्यक आहे. कारण पंचायत समिती ही जिल्हा परिषदेचेच एक अंग आहे. इतर समित्यांप्रमाणे, पंचायत समित्याही जिल्हा परिषदेचाच भाग आहेत. त्यामुळे दोन पंचायत समित्या डावलून, जेथे अडचण नाही तेथे निवडणुका घेता येणार नाहीत. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमानुसार पंचायत समिती सभापती हे, जिल्हा परिषद सभागृहाचेही सदस्यही आहेत. निवड प्रक्रिया वेगळी आहे. निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी यापूर्वी दोनदा गटरचना झाली, त्यात गट वाढले नंतर कमी झाले. पुन्हा आरक्षण, गटरचना झाली. आता निवडणुका होतील अशी अपेक्षा होती. परंतू आरक्षणाचा पेच निर्माण झाल्यामुळे अद्याप निवडणुका जाहीर नाही. सुरूवातील उमेदवार उत्साहात होते. परंतू, निवडणुका केंव्हा लागतील, याचाच अंदाज लागत नसल्याने इच्छूकांचाही उत्साह मावळला आहे. निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात. - संदेश कार्ले, माजी जि.प. सदस्य.
वीरशैव लिंगायत बणगार (रंगारी)समाज, शंकरलिंग देवस्थान ट्रस्ट वशंकरलिंग बणगार युवक संघटना यांच्यावतीने राज्यस्तरीय पहिला वधू-वरपालक परिचय मेळावा रविवारी मर्दामंगल कार्यालयात पार पडला. काशीपीठाचे जगद्गुरू डाॅ. मल्लिकार्जुनविश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा करण्यात शुभारंभ झाला. शहरासह विजयपूर, कलबुर्गी,बेळगाव, हुबळी, धारवाड, निपाणी,गदग, बनहट्टी, वळसंग या भागातील६५० युवक- युवती या मेळाव्यातसहभागी झाले होते. यावेळी सुमारेसाडेतीन हजार समाजबांधव एकत्रआले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. रमेशमणुरे ,शंकरलिंग देवस्थान अध्यक्षसंगमनाथ बागलकोटी, सचिव- गुरुराजबिज्जरगी, खजिनदार- विद्याधरशाबादी, ट्रस्टी- चन्नबसवराजधनशेट्टी, शंकरेप्पा गिडवीर. संमेलनसमिती अध्यक्ष सुरेश दुधगी, युवकसंघटना अध्यक्ष- सोमशेखर गोकावीआदी मान्यवर सदस्य, पदाधिकारी,समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचेनियोजन उत्कृष्टरीत्या केले होते. आयटी, अभियंता, उद्योजक, नोकरदार युवांचा सहभाग आयटी सेक्टर, इंजिनिअर, उद्योजक, व्यापार, नोकरदार,इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रात काम करणारे युवक- युवतीआपला परिचय करताना जोडीदार कसा असावा,व्यासपीठावर येऊन सांगत होते. माझे शिक्षण अमूक. मी याशहरात राहतोय. नोकरदार आहे, आयटी क्षेत्रात कामकरतेय, अशी अोळख करून देत होते. दोन्ही पक्षाकडीलपालकांना एखादे स्थळ पसंत पडल्यास दोन्हीकडीलपालकांचा संवाद होत होता. अतिशय नेटके व सूत्रबद्धनियोजन संयोजकांनी केले होते. ६५० वधू-वर यांचीमेळाव्यात नोंदणी झाली असून त्याची पुस्तिका काढण्यातयेणार आहे. नाते, विश्वास जपा: संसार सुखाचा होईल आपला मूळ धर्म सनातन हिंदू आहे. वीरशैव लिंगायत समाजातअनेक पोटजाती आहेत. या सर्व पोटजातीत विवाह करा . पैसासर्वस्व नाही, जगण्यासाठी पाहिजेच पण त्याला मर्यादा आहेत.मुख्य संस्कार पाहिजेत. घटस्फोट प्रमाण वाढत असून याचेकारण एकत्र कुटुंब पध्दती कमी होतेय. पूर्वी आजी- आजोबा,काका-काकू, भाऊ, बहिणी एकत्र राहत. मुलांवर संस्कार होत.जीवनाला दिशा मिळते. आई-वडील, आजी आजोबा यांचासन्मान करा. पती-पत्नीत विश्वास जपा. दोन्ही समान पध्दतीनेगेले पाहिजे, तरच संसार सुखाचा होईल. - डाॅ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी ,काशीपीठ
शेवग्याच्या शेंगाचे किरकोळ बाजारातील दर २८० प्रति किलो झाले आहेत. हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. यापूर्वी इतका कधीच वाढला नव्हता. बाजारात शेवग्याच्या शेंगा भाव खात आहेत. मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने दर वाढल्याचे बोलले जाते. बाजारात फारच कमी आवक होत असल्याने दर गगनाला भिडले आहेत. २८० रूपये प्रति किलोचा दर सर्वसामान्य, गोरगरीबांच्या खिशाला परवडणारा नाही. शेतकऱ्यांना मात्र, दिलासा मिळत आहे.
जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाचा आदेश:खड्ड्यांमुळे अपघातात जखमी, मयत झाल्यास मिळणार नुकसान भरपाई
अहिल्यानगर शहरातील महापालिकेने विकसित केलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन जखमी अथवा मृत्यू झाल्यास मयताच्या नातेवाईकांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे. उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर देण्यात आलेल्या आदेशानुसार यासाठी महापालिकेत समिती गठीत करण्यात आली असून अशा प्रकरणाबाबत अर्ज दाखल करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. उच्च न्यायालयातील जनहित याचिकेवर १३ ऑक्टोबर रोजी देण्यात आलेल्या आदेशानुसार मनपा हद्दीतील मनपाच्या रस्त्यांवर झालेल्या अपघातांबाबत नुकसान भरपाई देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत आयुक्त यशवंत डांगे यांनी माहिती देऊन महानगरपालिका हद्दीतील महानगरपालिकेमार्फत विकसित केलेल्या रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघातात कोणी जखमी झाल्यास त्यांना अथवा अपघातामुळे एखाद्यास जीव गमवावा लागल्यास त्यांच्या नातेवाईकांनी महापालिकेत पुराव्याशी अर्ज सादर करावा, असे म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत त्या अर्जावर योग्य कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. महामार्गावरील अपघात घटनेबाबत स्पष्टोक्ती नाही शहरातील महापालिकांच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनांची संख्या नगण्य आहे. मात्र, महापालिक हद्दीतून जाणाऱ्या महामार्गांवर सातत्याने अपघात होतात. त्यात खड्ड्यांमुळे होणारे अपघातही अधिक आहेत. मात्र, त्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही स्पष्टोक्ती करण्यात आलेली नाही.
रघुवीर खेडकरांचा सन्मान हा तमाशा कलेचाच गौरव : मंत्री राधाकृष्ण विखे
अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र व तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा यंदाच्या पद्म पुरस्काराने झालेला सन्मान महाराष्ट्राच्या ग्रामीण कलेचा गौरव असून तमाशा कलेचा नावलौकिक झाला असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली. रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री विखे यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. खेडकर परिवाराचे मोठे योगदान तमाशा कलेसाठी आहे. ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर यांच्याकडून मिळालेला कलेचा समृद्ध वारसा रघुवीर खेडकर यांनी यशस्वीपणे पुढे नेला. आव्हानात्मक परिस्थितीत तमाशा कलेला जिवंत ठेवण्यासाठी समर्पित भावनेने दिलेल्या योगदानाचा गौरव केंद्र सरकारने पद्म पुरस्कार देऊन केल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा पहिला राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार प्रवरा परिवाराने स्व. कांताबाई सातारकर यांना देऊन सन्मानित केल्याची आठवण मंत्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितली.
नगरसेवक मानधन, इंधनावर वार्षिक पावणेदोन कोटी खर्च:पदाधिकाऱ्यांच्या नव्या कारसाठी रु. 60 लाख मोजणार
महापालिकेत गेली तीन वर्षे असलेले प्रशासकीय राज आता संपुष्टात आले आहे. १०२ नगरसेवक निवडून आल्याने आता प्रशासन सभागृहातील निर्णयानुसार काम करणार आहे. त्यासाठी नगरसेवकांना मानधन, इंधन, चहापान, त्यांचे दौरे यावर खर्च होईल. त्याचा प्राथमिक आकडा दरवर्षी पावणेदोन कोटीचा आहे. नव्या पदाधिकाऱ्यांसाठी यंदा नवीन वाहने घेण्याचा घाटही घालण्यात आला आहे. त्यावर ५० ते ६० लाख रुपये खर्चाचा अंदाज आहे. मार्च २०२२ मध्ये सभागृहाची मुदत संपली. त्यानंतर तीन वर्षे निवडणूकच झाली नाही. त्यामुळे प्रशासनकडून कामकाज सुरू होते. त्यामुळे नगरसेवकांवरील खर्च वाचला होता. गेल्या ३ वर्षात सुमारे १५ कोटी रुपयांची बचत झाल्याचा अंदाज आहे. परंतु लोकशाही पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्था चालवण्यासाठी त्याचा खर्च अपेक्षितच आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, पक्षनेता, विरोधी पक्षनेते यांच्या दिमतीला महापालिकेच्या खर्चातून यंत्रणाही उभी करावी लागते. त्यांचे मानधन, चहापान, इंधन, स्टेशनरी आदींचा वार्षिक खर्च १ कोटी ७० लाख ४० हजार रुपये होईल. महापौर निवडीच्या पहिल्या सभेत सर्व १०२ नगरसेवक येतील. या दिवसापासूनच प्रशासनाच्या खर्चाला सुरुवात होणार आहे. महिन्यातून एकदा सर्वसाधारण सभा, आठवड्यातून एकदा स्थायी समिती, स्थापत्य, महिला व बालकल्याण या समित्यांच्या बैठकांसह इतर बैठकांवर चहापानाचा खर्च करावा लागतो.
ड्रग रॅकेटचे पारनेर केंद्र झालेअसून, या प्रकरणात थेट स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारीच सहभागी आहे, असा आरोप पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी करतानाच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटनांना आवर घालण्याचे निर्देश त्यांनी दिले. सिस्पे’ प्रकरणाची लवकरच सीबीआय चौकशी सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, वाळू तस्करावर मोठ्याप्रमाणात कारवाया सुरू आहेत. संगमनेर, श्रीरामपूरमध्ये या कारवायामुळे हा उपसा कमी झाला. मात्र जिल्ह्याच्या अन्य ठिकाणी अशा प्रकारे वाळू तस्करी सुरू आहे. अवैध धंदे बंद झाले पाहिजेत. डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून दोन हजार कोटीच्या गुंतवणुकीतून दहा ते पंधरा हजार जणांना रोजगार उपलब्ध होणारआहे असे त्यांनी यावेळी सांगितले. ज्ञानेश्वर सृष्टी संदर्भात बोलतानाते म्हणाले की, प्रवरा नदीवरआपण पूल व एक घाटही बांधतोआहे. त्यासाठी नव्याने एकआराखडा तयार केला जाणारआहे. नगर-मनमाडचे कामपुढच्या दीड वर्षात पूर्ण होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान ते पुढे म्हणाले जिल्हावार्षिक योजना (सर्वसाधारणअनुसूचित जाती व आदिवासीउपयोजना) २०२५-२६ अंतर्गतअहिल्यानगर जिल्ह्यासाठी १ हजार२७ कोटी ३१ लाखांचे नियतव्ययमंजूर असून, ८०१ कोटी ३७ रुपयेकिंमतीच्या प्रशासकीय कामांनामंजुरी देण्यात आली आहे. यंदाआर्थिक वर्षात जिल्हा नियोजनसमितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे विविध योजनांसाठी२५४ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. जिल्ह्यातील महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत यांच्याकडील योजनासाठी ७६ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. यावेळीआमदार काशिनाथ दाते, अमोलखताळ, मोनिका राजळे,आशितोष काळे, विठ्ठल लंघे,जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीअधिकारी आनंद भंडारी आदींचीउपस्थिती होती. धर्मवीर गडावर ५ कोटीतून शौर्यस्तंभ उभारणार श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथीलधर्मवीर गडावर ५ कोटीतून शौर्यस्तंभउभारणार, अहिल्यानगरच्या पासपोर्टकार्यालयाच्या नूतनीकरणासाठी १ कोटीरुपयांचा निधी देण्यात आला. जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनाचे ५लाखांचे अनुदान वाढवून थेट १ कोटीकरण्यात आले. अकोले तालुक्यातीलधुमाळवाडी येथील श्री. सोमेश्वर महादेवमंदिर देवस्थान, संगमनेर तालुक्यातीलधांदरफळ बु. येथील श्री. विठोबा देवमंदिर देवस्थान व खळी येथील श्री.खंडोबा मंदिर देवस्थान, तसेच कोपरगावतालुक्यातील देर्डे चांदवड येथील श्री.मारूती मंदिर देवस्थान अशा एकूण चारग्रामीण तीर्थक्षेत्रांना क'' वर्ग तीर्थक्षेत्राचादर्जा देण्यात आला. बैठक सुरू होण्यापूर्वीच सभापती शिंदे पडले बाहेर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठीविधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे,पालकमंत्री विखे हे जिल्हाधिकारी यांच्यादालनातून सभागृहात एकत्र गेले. बैठक पूर्णहोण्यापूर्वीच प्रा. राम शिंदे बाहेर पडले.त्यानंतर ते विखे यांच्या आयोजित पत्रकारपरिषदेसाठी उपस्थित पत्रकारांना भेटण्यासाठीआले. पत्रकारांनी बोलण्याचा आग्रह धरला.पण आपली बोलायची इच्छा नाही, असे तेम्हणाले. विखे यांनीही नाराजीचा काही विषयनसल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले. काचेची घरे असणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड फेकू नये'' राजकारणात मुद्दे संपले की, फोटो बाहेर काढायचे, बदनामीचा धुरळा उडवायचा आणि खोट्या प्रचारावर निवडणूक जिंकायची हा प्रकार आता उघडपणे सुरू आहे. मात्र,ज्यांची घरे काचेची आहेत त्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नयेत'' अशा शब्दांत खासदार नीलेश लंके यांनी माजी खासदारसुजय विखे यांना जाहीर इशारा दिला. आरोपांना लंके यांनी थेट आव्हान दिले. एकाफोटोवरून नाते जोडणे म्हणजे बालिशपणा असल्याचे ते म्हणाले.
शनिवार, रविवार आणि सोमवारी आलेलीप्रजासत्ताक दिनाची सुट्टी अशा सलगसुट्ट्यांचे निमित्त साधून, देश-विदेशातीललाखो भाविकांनी शिर्डी, शनिशिंगणापूरयेथे मोठी गर्दी केली. शनिशिंगणापुरातप्रशासक डॉ. प्रवीण गेडाम यांच्या कडकशिस्तीमुळे वर्षानुवर्षांचा ''लटकू'' आणिबेशिस्त वाहतुकीचा त्रास संपुष्टातआल्याने, भाविकांनी यंदा समाधान व्यक्त केले. देशाच्या तसेच राज्याच्या विविधभागांतून लाखो भाविक साईबाबांच्यादर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले असून,संपूर्ण शिर्डीनगरी भाविकांच्या गर्दीने फुलूनगेले. शनिवार व रविवार या अवघ्या दोनदिवसांत सुमारे दोन लाख भाविकांनी श्रीसाईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.पहाटेपासूनच समाधी मंदिरात दर्शन रांगालागल्या होत्या. गर्दी वाढत असतानाही साईसंस्थान प्रशासनाच्या नियोजनबद्धव्यवस्थेमुळे भाविकांना एक ते दीड तासांतसुकर व समाधानकारक दर्शन मिळाले.साईसंस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर,डेप्युटी सीईओ दराडे दर्शन रांगेत भाविकांनामदतकार्यात सहभागी झाले. विशेष म्हणजे,एवढ्या मोठ्या गर्दीतही कोणताही गोंधळ नहोता साईसमाधीचे दर्शन शांततेत वशिस्तबद्ध पद्धतीने होत असल्यानेभाविकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसूनआले. इतक्या गर्दीतही अवघ्या एक ते दीडतासांत दर्शन मिळाले. व्यवस्था अतिशयउत्तम आहे,” अशा प्रतिक्रिया अनेकभाविकांनी व्यक्त केल्या. २६ जानेवारीच्यासुट्टीमुळे सोमवारीही शिर्डीत भाविकांचीसंख्या वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळपासूनच शिंगणापूरभाविकांच्या गर्दीने फुलून गेले. दोनदिवसांत अंदाजे २ लाखांहून अधिकभाविकांनी चौथऱ्यावर नतमस्तक होऊनदर्शन घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे.वाढती गर्दी लक्षात घेता, देवस्थानचेकार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे आणिसहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळकेयांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्तठेवण्यात आला आहे. भाविकांकडून नव्याबदलांचे स्वागत देवस्थान प्रशासनानेभाविकांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी पार्किंगपूर्णपणे मोफत केली आहे. तसेच पूजा साहित्याचे दर कमी केल्याने सर्वसामान्यभाविकांना मोठा दिलासामिळाला आहे. या बदलांमुळेशिंगणापुरात खऱ्या अर्थानेपारदर्शकता आली आहे,अशी प्रतिक्रिया परराज्यातूनआलेल्या भाविकांनी दिली. देवस्थानला शिस्तलागली : आमदार लंघे गर्दीच्या पार्श्वभूमीवर आमदार लंघे यांनी देवस्थानचा आढावा घेतला. प्रशासक डॉ. गेडाम यांच्या खमक्याभूमिकेमुळे देवस्थानला शिस्तलागली आहे, आम्ही त्यांच्याकारभारात कोणताही राजकीयहस्तक्षेप करणार नाही, अशी ग्वाहीत्यांनी यावेळी दिली. तसेच,वारकरी संप्रदाय, संत-महंत आणिमोठ्या देणगीदारांसाठी स्वतंत्र वविशेष व्यवस्था असावी, यासाठीआपण प्रशासनाला पत्र देणारअसल्याचे त्यांनी नमूद केले.
सॉफ्टवेअर बदलाचा फटका:विवाह प्रमाणपत्रावर बारकोड अनिवार्य, आधी नोंदणी केलेल्यांना हजाराचा भुर्दंड
सप्टेंबर २०२५ पूर्वी विवाह नोंदणी केलेल्या नागरिकांसमोर आता एक नवे तांत्रिक संकट उभे आहे. आधार कार्ड नूतनीकरणासह विविध शासकीय कामांसाठी आता विवाह प्रमाणपत्रावर बारकोड अनिवार्य असल्याचे सांगितले जाते. मात्र जुन्या प्रमाणपत्रांवर ही सुविधा नसल्याने नोंदणीच्या किचकट प्रक्रियेतून जावे लागते. हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागतो आहे. जळगाव मनपा विवाह नोंदणी कार्यालय येथे दररोज १० ते १५ नागरिक बारकोड असलेल्या नवीन प्रमाणपत्रासाठी अर्ज करत आहेत. महिन्याला ८०० ते ९०० अर्ज दाखल होत आहेत. नोंदणी कार्यालयात एकच कर्मचारी असल्याने नवीन प्रमाणपत्रासाठी तब्बल तीन महिने लागताहेत. कलेक्टर कार्यालयातील दुय्यम निबंधक कार्यालयात अशा अर्जाची संख्या शून्य आहे. असे आहेत बारकोड आणि क्यूआर कोडचे फायदे करून मिळते बारकोडचे प्रमाणफत्र अर्जाची तपासणी विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर बारकोड नसेल त्यांनी सर्व कागदपत्रांसह जुने विवाह नोंदणी प्रमाणपत्र (महापालिकेत यापूर्वी नोंदणी केली असेल तरच किंवा ज्या कार्यालयाकडून विवाह नोंदणीचे प्रमाणापत्र घेतले असेल त्या कार्यालयात) अर्ज जमा करावे. आलेल्या अर्जाची तपासणी करून बारकोड असलेले प्रमाणपत्र त्या त्या कार्यालयातर्फे देण्यात येते. यासाठी साधारणपणे एक ते दीड महिना लागतो; मात्र एखाद्या ठिकाणी बारकोड नसलेले विवाह प्रमाणपत्र नसल्याने जर कोणी अडवणूक करत असेल तर त्याची तक्रार विवाह नोंदणी अधिकारी यांच्याकडे करावी. पुन्हा नव्याने नोंदणी करावी लागेल बारकोड नसलेल्या प्रमाणपत्रावर बारकोड मिळवण्यासाठी नव्याने नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी निर्धारित शुल्क भरावे लागेल. यानुसार नवीन रेकॉर्ड तयार होईल. महापालिकेत यापूर्वी जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणि बारकोडसाठीचा अर्ज द्यावा लागणार आहे. -डॉ. मनीषा उगले, विवाह नोंदणी अधिकारी, मनपा सॉफ्टवेअर बदलामुळे बारकोड बारकोडबाबत स्वतंत्र शासन आदेश नाही; मात्र सॉफ्टवेअर बदलल्यामुळे आता बारकोडची सुविधा आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही बारकोडयुक्त प्रमाणपत्रे देत आहोत. जुनी प्रमाणपत्रेही ग्राह्य धरली जावीत. बारकोडसाठी अडवणूक करू नये. -जी. पी. राठोड, विवाह नोंदणी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
दोन महिन्यांपासून सोने-चांदी या दोन धातूंच्याकिमतीत मोठी तेजी आहे. चांदीच्या मर्यादितसाठ्यामुळे चांदीला पर्याय म्हणून कॉपर अर्थाततांबे या धातूचा पर्याय ठरू शकेल असे संशोधनसुरू असल्याने तांब्याच्या मागणीत मोठी वाढहोत आहे. सोने-चांदी, हिरे विकणाऱ्या जळगावसराफात चक्क तांब्याचे बार (एक किलो) महिन्याभरापासून विक्री होत आहे. महिन्याभरातसुमारे १ हजार किलो कॉपरची विक्री झाली आहे. याच कालावधीत मागणीत वाढ झाल्यानेकॉपरच्या किमतीत ६०० रुपयांची वाढ झालीआहे. चांदीला पर्याय ठरू पाहणाऱ्या कॉपरचेप्रथमच एक किलोचे बार बाजारात आहेत. भाव ६०० रुपयांनी वाढले जळगाव सराफात सोन्या-चांदीच्यादागिन्यांना घडवण्यासाठी शुद्ध तांबेलागते. मात्र, त्याची मागणी मर्यादितस्वरूपाची असते. महिन्याभरापासूनसराफात हे बार विक्रीसाठी आलेआहेत. त्यावेळी एका बारची किंमत१३०० ते १४०० रुपयांच्या घरात होती. तीआज २००० रुपये झाली आहे.महिनाभरात एक हजार किलोपेक्षाजास्त विक्री झाली असल्याचेव्यावसायिक योगेश मोरे यांनी सांगितले. तीन वजनात उपलब्ध शुद्ध तांब्याचे बार १ किलो, ३ किलो व ५ किलो या वजनात उपलब्ध आहेत. अनेक ग्राहक ५ किलो,१० किलो, ५० किलो, १०० किलोपर्यंत शेअर्सप्रमाणे आगामी काळात कॉपरचे भाव वाढतील असे मानून बुकिंग करताहेत. भविष्यातचांदीला पर्याय म्हणून तांब्यावर संशोधन झाल्यास त्यामुळे त्याचे भाव सोने-चांदी प्रमाणे वाढू शकतील असे गुंतवणूकदारांना वाटते. अहमदाबाद, मुंबईहून येतेय शुद्ध तांबे जळगाव सराफात सुमारे १२५ लहानमोठे सराफाव्यावसायिक आहेत. गेल्या काही महिन्यांपासूनचांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने चांदीच्या वस्तूंचाव्यापार करणाऱ्या व्यावसायिकांच्या व्यवहारांवरमोठा परिणाम झाला आहे. असे जवळपास १५ ते २०व्यापारी तांब्याचे (कॉपर) बार विक्रीच्या व्यवसायातसहभागी झाले आहे. त्यांच्याकडे हे एक किलोवजनाचे शुद्ध कॉपर (९९.९%) बार विक्रीसाठीमहिन्याभरापासून उपलब्ध झाले आहेत. जळगावसराफात प्रामुख्याने गुजरात राज्यातील अहमदाबाद वमुंबई या दोन ठिकाणच्या रिफायनरीतून ते येताहेत.
जळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्यामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्याबसस्थानकाचा आणि आगाराचा चेहरामोहराबदलणार आहे. सुमारे ६० वर्षांपूर्वीचे जुनेबांधकाम हटवून त्या ठिकाणी ४० कोटी रुपयेखर्च करून भव्य आणि अद्ययावतबसस्थानक, आगार आणि विभागीय कार्यालयउभारण्याचा प्रस्ताव जळगाव विभागानेमध्यवर्ती कार्यालयाकडे पाठवला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीयासाठी विशेष पुढाकार घेतला असून, परिवहनमंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे. नवीनबसस्थानकाची सध्याची इमारत १९६४-६५मधील असून, आगाराचे बांधकाम १९५३-५४मध्ये झालेले आहे. या इमारतींचे आयुर्मानसंपले आहे. अलीकडेच झालेल्या स्ट्रक्चरलऑडिटमध्ये विभागीय कार्यालयाची इमारततातडीने खाली करण्याच्या सूचना देण्यातआल्या आहेत. प्रवाशांची वाढती संख्या आणिअपुऱ्या सुविधा लक्षात घेता, या संपूर्णपरिसराची पुनर्बांधणी करणे अनिवार्य झालेआहे. विभागीय नियंत्रक यांनी या कामाचेसविस्तर अंदाजपत्रक तयार केले आहे. असा असेल नवा प्रकल्प १ . सध्याच्या १६ फलाटांऐवजी आता२४ फलाटांचे प्रशस्त बसस्थानकउभारले जाईल. तळमजला व पहिल्यामजल्यावर प्रशासकीय कार्यालये,वाणिज्य गाळे, पास रूम, उपाहारगृह वप्रवाशांसाठी प्रसाधनगृहे असतील. २. आगारातील संपूर्ण वाहनतळाचेकाँक्रिटीकरण होईल. अधिकारी आणिकर्मचाऱ्यांसाठी नवीन निवासस्थाने वविश्रांतीगृहे बांधली जातील. नवीनइमारतीत फायर फायटिंग सिस्टिम,सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. परिवहन मंत्र्यांना गुलाबरावांचे पत्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी परिवहन मंत्री प्रतापसरनाईक यांना पत्र लिहून या कामासाठी तातडीनेनिधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.५०-६० वर्षांपूर्वीचे हे बांधकाम जीर्ण असून, प्रवाशांचीमोठी गैरसोय होत आहे. जळगावच्या वैभवात भरघालणारे हे नवीन बसस्थानक व्हावे, ही आमचीप्राथमिकता आहे, असे पालकमंत्र्यांनी नमूद केले आहे. मुंबई कार्यालयाला प्रस्ताव बसस्थानकाची इमारती फार जुनीझाली आहे. पंधरा दिवसांपूर्वीबसस्थानकाचा कायापालट करण्यासाठीमुंबई कार्यालयाला प्रस्ताव सादरकरण्यात आला आहे. शासनाचा निधीमिळाला तर लवकर काम सुरू होईल. - दिलीप बंजारा, विभाग नियंत्रक
नाशिक महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच शांतारामबापू वावरे यांच्या रुपाने नाशिककला महापौरपद मिळाले. तेव्हापासून ते आजतागायत ३४ वर्षांच्या कार्यकाळात सिडको विभागाला एकदाही महापौर पद मिळालेले नाही. याउलट पूर्व विभागास तब्बल ७ वेळा तर पंचवटी विभागास ५ वेळा महापौरपद मिळालेले आहे. याशिवाय पश्चिम नाशिक, सातपूर व नाशिकरोड विभागाला प्रत्येकी एक वेळा महापौरपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे यंदा सिडकोतील महिलेली महापौरपदी निवड व्हावी अशी अपेक्षा सिडकोवासीयांना लागलेली आहे. महापौरपदाच्या आरक्षण सोडतीत सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. पालिका निवडणुकीत भाजपला ७२ जागा जिंकल्याने स्पष्ट बहुमत मिळाल्याने याच पक्षाचा महापौर होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे इच्छुकांनी लॉबिंग सुरु केलेले आहे. विशेष म्हणजे, नाशिक पश्चिम मतदारसंघात म्हणजेच सिडको-सातपूर विभागात २०१७ च्या निवडणुकीत भाजपचा आकडा ४७ पैकी २२ नगरसेवक होता, परंतु यंदाच्या निवडणुकीत ही संख्या ४७ पैकी ३० वर पोहचली असल्याने सिडकोकडे हे पद आले पाहिजे, अशी मागणी आमदार सीमा हिरे यांनी केली आहे. असे आहेत विभागनिहाय महापौरपद भूषवलेले नावे पूर्व : स्व. शांताराम वावरे, स्व. पंडितराव खैरे, वसंत गिते, अशोक दिवे, विनायक पांडे, यतीन वाघ, सतीश कुलकर्णी. पंचवटी : स्व. उत्तमराव ढिकले, डॉ. शोभा बच्छाव, बाळासाहेब सानप, अशोक मुर्तडक, रंजना भानसी सातपूर : दशरथ पाटील पश्चिम : प्रकाश मते नाशिकरोड : नयना घोलप महाजन यांच्याकडे फिल्डिंग महापौर पदासाठी भाजपकडून अंतिमत: तीन ते चारच महिलांची नावांमध्ये स्पर्धा अाहे. ३० जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया होणार आहे. तत्पूर्वी इच्छुकांचे समर्थक मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे लॉबिग केले जात आहे. त्यांचाच शब्द अंतिम असल्याने काही मुंबईत तर काही इच्छुकांनी थेट जामनेर गाठल्याची चर्चा आहे. तर प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनासाठी महाजन नाशकात येणार असल्याने इच्छुक हे भेट घेण्यासाठी फिल्डिंगमध्ये आहेत.
सांगली जिल्ह्यातील मिरजजवळील खेड्यातून प्रवास सुरू केलेला हॉटेलमधील वेटर आज आपल्या कलोपासनेमुळे सातासमुद्रापार पोहोचला आहे. त्यांची वेटर ते गिनीज बूकपर्यंतची झेप प्रेरणादायी आहे. चंद्रकांत बडीगेर यांनी कॅलिग्राफीच्या कलेतून केवळ आपले आयुष्य बदलले नाही, तर हजारो लोकांची मने जिंकली आहेत. नावातून गणपती साकारण्याची त्यांची कला आज त्यांच्या यशाची ओळख ठरली आहे. नाशिकमध्ये आयोजित तान महोत्सवात ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर समोर आलेला त्यांचा हा प्रवास. चंद्रकांत बडीगेर यांचे आयुष्य सुरुवातीला अत्यंत संघर्षमय होते. उदरनिर्वाहासाठी त्यांनी काही काळ हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले. मात्र, आर्थिक अडचण अन् परिस्थिती बेताची असताना त्यांना कलेचा नवा मार्ग सापडला. १७ जुलै २०१३ पासून ते कॅलिग्राफी कला जोपासत आहे. त्यांनी सांगलीतील मारुती चौकात पहिला स्टॉल उभारला. त्या दिवशी त्यांनी ‘चंद्रशेखर’ हे पहिले नावाचे गणपती काढले आणि तेथून त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. २०२४ मध्ये त्यांच्या या अनोख्या कलेची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. गावातून सुरू झालेला प्रवास पोहचला परदेशात लहान स्टॉलपासून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू राज्यभर पोहोचला. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, गणेशोत्सव, हळदी-कुंकू समारंभात त्यांच्या कलेला मोठी मागणी निर्माण झाली. लोकांच्या पसंतीमुळे त्यांनी पंधरा हजार रुपयांचे कर्ज फेडले आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम जीवन उभे केले. आज भारतातील विविध राज्यांसह परदेशातूनही त्यांना या कलेसाठी आमंत्रण येत असल्याचे ते सांगतात. ३० सेकंदांत नावात साकारतात गणपती बाप्पा नाममात्र शुल्क घेत ३० सेकंदांत पांढऱ्या कार्डशिटवर बडीगेर हे नावाचा गणपती काढून देणे हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य आहे. नाशिकमध्ये तान महोत्सवात पहिल्याच दिवशी १५ हजार नाशिककरांनी त्यांच्याकडून नावाचे गणपती काढून घेतले. त्यांच्या स्टॉलवरील गर्दी त्यांच्या कलेची पावती दर्शवणारी ठरली. पत्नी-मुले याच क्षेत्रात कार्यरत, कपल नेमही बडीगेर यांनी ही कला पत्नी व दोन्ही मुलांनाही शिकवली आहे. त्यांचा मुलगा तब्बल १२ भाषांमध्ये नावाचा गणपती काढतो, तसेच ‘कपल नेम’ गणपती साकारण्यातही निपुण आहे. संपूर्ण कुटुंब कॅलिग्राफी क्षेत्रात कार्यरत आहे.
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मुंबईच्या दिशेने निघालेला विराट मोर्चा रविवारी (दि. २५) नाशिक शहरात घडकला. २० हजारांहून अधिक आदिवासी बांधवांचा हा जनसागर शहरात दाखल होताच ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीचा फटका मोर्चा तब्बल तीन तासापर्यंत वाहनधारकांना बसला. सकाळी ९ वाजता दिंडोरी रोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरापासून मोर्चाला प्रारंभ झाला. दुपारी ४ वाजता मोर्चा महामार्गावरून विल्होळीच्या दिशेने निघाल्यांनतर वाहतूक सुरळीत झाली. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या हजारो पर्यटकांनाही विस्कळीत झालेल्या वाहतूकीमुळे पर्यायी मागाँचा शोध घेत मनस्ताप सहन करावा लागला. ठिकठिकाणी वाहने अडकून पडली २६ जानेवारीच्या निमित्ताने आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे नाशिक, त्र्यंबक आणि शिर्डीकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची गर्दी झाली होती. त्यातच शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या या मोर्चामुळे त्र्यंबकरोड, शालीमार चौक, एमजी रोड, अशोकस्तंभ, सीबीएसच्या चारही बाजूला रिक्षा, बसेस व पर्यटकांची वाहने अडकल्याने कोंडी झाली. मुंबईनाका परिसरातून मोर्चा पुढे जाताना पुन्हा भाभानगर, द्वारका, इंदिरानगरकडून महामार्ग थानकाकडे येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या. अशीच स्थिती गोविंदनगर बोगद्याकडून लेखानगर, पाथर्डी फाट्याकडे समांतर स्त्यावरून जाताना वाहने अडकून पडले होते. या भागात वाहतूक कोंडी निमाणीवरून पंचवटी कारंजा, होळकर पुलावरून रविवार कारंजा भागातून मेहेर सिग्नलवरून जिल्हाधत्रकारी कार्यालयासमोर मोर्चा येवून थांबला. तोपर्यंत पंचवटी ते आरके भागात वाहतूक कांडी झाली होती. मोर्चाच्या मार्गावर पोलिसांचा फौजफाटा अशोक स्तंभ, जिल्हाधिकारी कार्यालय आणि सीबीएस परिसरात पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहतूक वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंतर्गत गल्ल्यांमध्येही वाहने अडकल्याने सर्वत्र ट्रॅफिक जॅम ची स्थिती निर्माण झाली होती. या मोर्चाच्या मार्गावर सुट्टीच्या दिवशीही ४० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले. - संदीप मिटके, सहायक आयुक्त
हनुमान मंदिर चोरीचा 15 तासांतच छडा:2 लाखांचा मुद्देमाल जप्त; 5 आरोपींना 6 दिवसांची पोलिस कोठडी
पदमपुरा परिसरातील १५० वर्षे प्राचीन हनुमान मंदिरातील मूर्तीचे दागिने आणि दानपेटी लंपास करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अवघ्या १५ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्याने तपासात सुरुवातीला अडथळा येत होता, मात्र सायबर पोलिसांनी डिजिटल मल्टिमीडिया फॉरेन्सिक आणि एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने धूसर प्रतिमा स्पष्ट केली. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मोडस ऑपरेंडी ब्युरो रेकॉर्डवरील ५ सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून २.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमजद खान सलीम खान (२८, रा. जलाल कॉलनी) टोळीप्रमुख व रेकॉर्डवरील गुन्हेगार, शेख शोएब शेख बाबा (३०, रा. अलहिलाल कॉलनी), शेख समीर शेख सलीम (२३, रा. कटकट गेट), शेख आमेर शेख नब्बू (२९, रा. रोजाबाग), इम्रान खान ऊर्फ इम्मा युनूस खान (२२, रा. कटकट गेट) अशी या आरोपींची नावे आहेत. पोहे खाल्ले आणि मंदिरात घुसले तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२३ जानेवारी) मध्यरात्री ही टोळी रेल्वेस्टेशन परिसरात पोहे खाण्यासाठी एकत्र आली होती. तेथून त्यांनी चोरीचा बेत आखला आणि पदमपुरा येथील हनुमान मंदिर गाठले. अवघ्या ३० मिनिटांत दोघांनी मंदिरातील मूर्तीवरील सोन्याचा टिळा, चांदीच्या भुवया, डोळे, पायथ्याचे कडे आणि त्रिशूळ असा मौल्यवान ऐवज लंपास केला. या वेळी टोळीतील इतर तिघे बाहेर दुचाकीवर पाळत ठेवून उभे होते. गुन्ह्याचा डिजिटल उलगडा आयुक्त प्रवीण पवार यांनी तपासासाठी ५ पथके तैनात केली होती. पोलिसांनी परिसरातील २० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. अंधारामुळे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. सायबर निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या टीमने एआय सॉफ्टवेअर वापरून प्रतिमा स्पष्ट केल्या. एमओबी डेटाबेसशी त्यांची तुलना केली असता हर्सूलमधील बुद्धमूर्ती चोरी करणारा आरोपी अमजद खान याची ओळख पटली. सैलानीत दर्शनाला गेले अन् हाती बेड्या पडल्या मुख्य आरोपी अमजदला ताब्यात घेतल्यानंतर समजले की, त्याचे साथीदार शेख समीर, शेख आमेर आणि इम्रान खान हे चोरीच्या पैशांवर मौजमजा करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथे दर्शनासाठी गेले आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ बुलढाणा गाठून तिथून त्यांना झडप घालून ताब्यात घेतले. काय आहे एमओबी तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाद्वारे अस्पष्ट किंवा पिक्सेलेटेड झालेल्या सीसीटीव्ही फुटेजला स्पष्ट केले जाते, ज्यामुळे गुन्हेगारांचे चेहरे किंवा शारीरिक खुणा ओळखणे सोपे होते. एमओबी हा पोलिसांचा असा डेटाबेस आहे, ज्यात सराईत गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीची (उदा. मंदिर फोडणे, घरफोडी) आणि त्यांच्या फोटोंची नोंद असते.
‘मी उज्जैनचा नागा साधू आहे. तुमच्याकडचे सोने द्या, त्याचे डबल करून देतो,’ असे म्हणत ज्येष्ठ नागरिकाकडून सोनसाखळी अन् अंगठी घेतली. त्यानंतर ‘५ पावले मागे जा,’ म्हणत चोरट्यांनी कारमधून पलायन केले. हा प्रकार २४ जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास दर्गा परिसरातील पोदार शाळेजवळ घडला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात दोघाविरोधात गुन्हा केला आहे. याप्रकरणी पोलिसांच्या माहितीनुसार, अप्पाराव रामराव बेंबडे (७५, रा. देवानगरी, शहानूरवाडी) हे २४ जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास फिरण्यासाठी गेले होते. काही वेळातच त्यांच्याजवळ आलिशान कार येऊन थांबली. त्यात दोघेजण होते. त्यांच्यापैकी कपडे न घातलेल्या, अंगाला भस्म लावलेल्या व्यक्तीने फिर्यादीला जवळ बोलावून घेतले. ‘मी उज्जैन येथील नागासाधू असून, सोने दुप्पट करून देतो,’ असे सांगितले. साधूने स्वतःकडचे ५०० रुपये आणि एक रुद्राक्ष फिर्यादीला दिला. आणि हे तुमच्या तिजोरीत नेऊन ठेवा, त्यानंतर तुमचे पैसे दुप्पट होतील, असे सांगितले. त्यानंतर साधूने तुमच्याकडे काही सोने असेल तर ते मला काढून द्या, मी त्याचे डबल करून देतो, असे सांगितले. मागे जाण्यास सांगून ठोकली धूम फिर्यादीने दीड तोळ्याची सोन्याची साखळी, एक तोळ्याची सोन्याची अंगठी काढून साधूला दिली. साधूने फिर्यादीला तुम्ही आता ५ पावले मागे जा, असे म्हणाला. फिर्यादी मागे जाताच कारमधून साधूने धूम ठोकली. १५ मिनिटे फिर्यादी नागा साधूची वाट पाहत थांबले, परंतु कार आली नाही. फसवणूक केल्याचे स्पष्ट होताच फिर्यादीने ठाण्यात तक्रार दिली.
छत्रपती संभाजीनगर शहरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या लातूरच्या टोळीला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (२४ जानेवारी) मध्यरात्री महामार्गावर मृत्यूचा थरार अनुभवला. केंब्रिज चौक ते गणेश कॉलनी या १० किलोमीटरच्या अंतरात तस्करांनी पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी दोन वेळा गाडी अंगावर घालत ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हे शाखेचे अंमलदार दादासाहेब झारगड यांनी धावत्या कारच्या बोनेटवर उडी मारून काच फोडली.त्यामुळे कारच्या चालकाला पुढे दिसण्यास अडचण झाली. त्यामुळे गाडीचा वेग मंदावला. आणि पोलिसांच्या गाड्यांना आरोपींच्या गाडीला घेराव घालत १८.७८ लाखांच्या मुद्देमालासह तिघांना बेड्या ठोकल्या. शेख समीर राजसाब (२४, लातूर), सय्यद अल्ताफ वहाब (२३, उदगीर, लातूर), उमर अब्दुल सहाब (३६, लातूर) या तिघांना अटक केली. पदमपुऱ्यातील हनुमान मंदिराच्या तपासकामी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शनिवारी वाहने तपासणीचे आदेश दिले होते. ८९ टक्क्यांचा मानकरी विद्यार्थ्याचा तस्करीपर्यंत प्रवास या प्रकरणातील धक्कादायक खुलासा म्हणजे अटकेतील शेख समीर राजासाब लातूरच्या नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या समीरला १२ वीत ८९ टक्के गुण होते. मात्र, झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी हा गुणवंत विद्यार्थी तस्करीकडे वळला. लातूरच्या मराठवाडा मेडिकलमधून केवळ ४० रुपयांच्या कमिशनसाठी हा माल आणला जात होता. ८० रुपयांची बाटली शहरात ४०० रुपयांना विकण्याचे या टोळीचे नियोजन होते. आयुक्तांचा कॉन-कॉल अन् रिअल टाइम ट्रॅकिंग आरोपींची कार सुसाट धावत असताना पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तातडीने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कॉन्फरन्स कॉलवर घेतले. आरोपींचे लोकेशन आणि ते ज्या दिशेने जात आहेत याची माहिती रिअल टाइममध्ये सर्व पोलिस ठाण्यांना दिली जात होती. यामुळेच शहरातील विविध चौकांत अवघ्या काही मिनिटांत नाकेबंदी लागली आणि पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद झाले. केंब्रिज चौक ते टीव्ही सेंटरपर्यंत केला पाठलाग रात्री ९:२० च्या सुमारास पीएसआय प्रवीण वाघ यांचे पथक केंब्रिज चौकात असताना तवेरा (एमएच-१२ एचएन-९९१७) संशयास्पद वाटली. पोलिसांनी इशारा करूनही गाडी न थांबवली नाही. ही कार ताशी १०० किमीपेक्षा जास्त वेगाने सावंगी बायपास, नारेगाव, बजरंग चौकमार्गे टीव्ही सेंटरकडे झेपावली. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी आयपी मेसजवळील चौकात गाडी आडवी लावून आरोपींचा रस्ता रोखला. पुढे गणेश कॉलनी परिसरात अंमलदार गणेश सागरे यांनी कार रोखण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्यांना धडक दिली. ज्यामध्ये सागरे जखमी झाले.
‘आरोग्यं भास्करादिच्छेत’: सूर्यजयंतीनिमित्त शहरातील विविधमंदिरांत, तसेच महिलांच्या गटांनीहळदी-कुंकू देत रथसप्तमी साजरीकेली. सृष्टीचा आधारस्तंभ अन्ऊर्जेचा अखंड स्रोत असलेल्याभगवान सूर्यदेवाची उपासना करण्यातआली. संक्रांतोत्सवाचा हा शेवटचादिवस असल्याने अनेक ठिकाणीहळदी-कुंकवाचे कार्यक्रम ठेवण्यातआले होते. साताऱ्यातील सरस्वतीदेवी मंदिरातील उत्सव वेगळेपणामुळेविशेष ठरला. आस्था जनविकास संस्थेच्या डॉ.आरतीश्यामल जोशी यांनी हेआयोजन केले होते. यावेळी सजगसंस्थेच्या डॉ. स्मिता अवचार, प्रा.भारती भांडेकर, अॅड. ज्योती पत्कीयांची विशेष उपस्थिती होती. डॉ.जोशी म्हणाल्या, ‘सौभाग्यवतींनाहळद-कुंकू लावत वाण देणे हीशतकानुशतकांची परंपरा आहे. मात्र,यामध्ये आपण नकळत समाजातीलविधवा महिला, अविवाहित कन्या,प्रौढ अविवाहित महिलांना दूर ठेवतो.पती या उत्सवाच्या केंद्रस्थानी असतो. हा सण महिलांचा असला तरीजीवनात पुरुषाची उपस्थितीच सर्वोच्च असल्याचे यातून दिसूनयेते, पण ज्या महिला आपल्यालासाथ देतात त्यांचा सन्मान यामध्येहोणे अपेक्षित आहे. विविध जाती,धर्म आणि पंथातील महिलांना एकत्रआणून हा सण अधिक समावेशकबनवायला हवा. या प्रेरणेने मी काहीवर्षांपासून हळद-कुंकूची परंपरासोडून ‘मकरसंक्रांती स्नेहमिलन’कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.घरगुती मदतनीससह प्राचार्या,डॉक्टर, पोलिस अधिकारी, पत्रकारमहिलांना एकाच व्यासपीठावरआणले जाते. यासाठी संवादमहत्त्वाचा असतो.’ संक्रांतीनिमित्त अनोखे वाण रिकाम्या पडलेल्या बाटल्यांवर आकर्षकपेंटिंग करून या भेटवस्तू स्वरुपात देण्यातआल्या. समाजाला निरोगी आणि मजबूतठेवण्यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊनचालले पाहिजे. सण नकळत लोकांमध्येअंतर निर्माण करणारा नसून मनमिळवणारा हवा, अशी अपेक्षा डॉ. जोशीयांनी व्यक्त केली. धर्मग्रंथांनुसार रथसप्तमीचा अर्थ अन् महत्त्व हिंदू धर्मग्रंथांनुसार, माघ सप्तमीला सूर्यदेव सात घोड्यांच्या रथावरआरूढ होऊन प्रकट झाले. म्हणूनच या दिवसाला ‘रथसप्तमी’ असेम्हणतात. हे सात घोडे म्हणजे इंद्रधनुष्यातील सात रंग आणिआठवड्याचे सात दिवस मानले जातात. वेदमृर्ती रामकृष्ण बारहातेम्हणाले, शास्त्रानुसार या दिवसापासून सूर्याच्या रथाचे तोंड उत्तरेकडेवळते, म्हणजेच उत्तरायणाची गती अधिक स्पष्ट होते. ‘आरोग्यंभास्करादिच्छेत’ या उक्तीनुसार आरोग्य आणि बुद्धीच्या प्राप्तीसाठीहा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
साधारणतः तीन वर्षांच्या कालावधीनंतर जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर तब्बल आठ वर्षांनंतर या निवडणुका पार पडत आहेत. मधल्या काळात मतदारांसह कार्यकर्त्यांसोबत या नेते मंडळींनी संपर्क न ठेवल्यामुळे आणि निवडणुकांची लगबग सुरू झाल्याने प्रचाराला कार्यकर्ते मिळत नाहीत. त्यामुळे उमेदवारांना आता प्रचारासाठी नातेवाइकांचा गोतावळा जवळ करावा लागत आहे. त्यामुळे सर्वच उमेदवार नातेवाइकांचा शोध घेताना दिसत आहेत. नुकतीच महानगरपालिकेची रणधुमाळी संपली. वरिष्ठ न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जाहीर केली. या निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला आहे. नुकतीच २२ जानेवारी रोजी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. कोणते उमेदवार रिंगणात राहणार हे निश्चित झाले. परंतु या उमेदवारांनी मागील काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुका साधारणतः तीन वर्ष लांबणीवर पडल्यामुळे या निवडणुका नेमक्या कधी होतील याची शाश्वती नसल्याने मतदारांसह आपापल्या कार्यकर्त्यांशी संपर्क न ठेवल्यामुळे सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर दिसत आहे. त्यामुळे गाव दौरे करण्यासाठी उमेदवारासोबत कार्यकर्ते दिसत नाहीत. ऊसतोडीमुळे मतदानाचा टक्का कमी होणार चारठाणा गटासह जिंतूरतालुक्यातील इतरही गटांमध्ये मोठ्याप्रमाणावर तांडे, वाड्या, वस्तीअसल्याने या तांडे, वाड्या,वस्त्यांवरील नागरिक मोठ्याप्रमाणावर ऊस तोडणीसाठी इतरजिल्ह्यांमध्ये स्थलांतरित झाल्यानेमतदानाचा टक्का काही प्रमाणातकमी होण्याची शक्यता वर्तविण्यातयेत आहे. स्थलांतरामुळे मतदारांना शोधण्यासाठी तारांबळ उमेदवारांनी प्रचारासाठी आताआपल्या नातेवाइकांचा गोतावळाजमा करत आहे. त्याचबरोबर यापाहुणे मंडळींना गावांची जबाबदारीहीदिली जात आहे. ग्रामीण भागामध्येमागील आठ वर्षांत खूप मोठाफेरबदल झाला. बरेच मतदारस्थलांतरित झाल्यामुळे आपल्यालामतदारांना शोधण्यासाठी उमेदवारांचीतारांबळ उडत आहे.
श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या भावनेतून भाविक साईबाबांच्या चरणी मनोभावे दान अर्पण करत असतात. अमेरिकेतील साईभक्त अंकिता राजेंद्र पटेल यांनी श्री साईबाबांच्या चरणी ७०० ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला. हा मौल्यवान सुवर्ण मुकुट श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे विधिवत सुपूर्द करण्यात आला. या मुकुटाची किंमत सुमारे १ कोटी १ लाख ३८ हजार १०० रुपये आहे. याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दानशूर साईभक्त अंकिता राजेंद्र पटेल यांचा सत्कार केला व त्यांच्या दानाबद्दल मनःपूर्वक आभार मानले. देशाबाहेर राहूनही साईबाबांप्रति असलेली ही नितांत श्रद्धा आणि भक्ती भाविकांसाठी प्रेरणादायी असल्याचे गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले. देश-विदेशातील साईभक्तांकडून अशा प्रकारे होणारी दाने ही साईबाबांवरील अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे. दरम्यान, सलग सुट्या आल्याने महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक सध्या शिर्डीत दाखल होत असल्याचे सांगण्यात आले आहे. हुंडीतील देणगीव्यतिरिक्त या वर्षातील मोठे दान सध्या सुटीचा काळ सुरू असल्याने शिर्डीत भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. देणगी देणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. नवीन वर्षात रोख, हुंडी आणि वस्तूंची देणगीव्यतिरिक्त सुवर्ण मुकुटाचे दान या वर्षातील मोठे दान आहे. संस्थानचे सेवाभावी कार्य देश-विदेशातील साईभक्तांकडून दरवर्षी श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात सोने, चांदी, विविध वस्तू तसेच हुंडीतून दान प्राप्त होते. भाविकांच्या श्रद्धेतून मिळालेल्या या देणगीचा उपयोग संस्थानकडून समाजोपयोगी व सेवाभावी कार्यांसाठी केला जातो. या निधीतून भाविकांसाठी पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या असून विनामूल्य उपचारासाठी साईबाबा व साईनाथ ही दोन रुग्णालये आहेत.
हिंद-दी-चादर श्री गुरू तेगबहादूर यांनी केवळ शिखांसाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेसाठी बलिदान दिले आहे. धर्माच्या रक्षणासाठी ते लढत राहिले. हा इतिहास वीरता आणि शौर्याचा आहे. हा इतिहास शीख पंथापर्यंत मर्यादित न राहता भारतातील प्रत्येकाला माहीत झाला पाहिजे. यासाठी यापूर्वी नागपूर, नांदेड आणि आता मुंबईत शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. हे सरकार एवढ्यावरच थांबणार नसून नानकलेवा संगतच्या माध्यमातून गुरू तेगबहादूर यांच्या शौर्यगाथेचा इतिहास घराघरात पोहोचवणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. शिखांचे नववे गुरू तेगबहादूरसाहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम सोहळ्यानिमित्त मागील दोन दिवसांपासून मोदी मैदानावर हिंद-दी-चादर कार्यक्रम होत आहे. रविवारी या कार्यक्रमाचा समारोप झाला या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संत बाबा कुलवंतसिंघ, संत बाबा बलविंदरसिंघ, संत बाबा हरनामसिंघ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण तसेच दिल्लीचे उद्योगमंत्री स. मनजिदरसिंघ सिरसा आणि राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री अतुल सावे, मंत्री गिरीश महाजन, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबिरसिंघ आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. फडणवीस म्हणाले की, हिंद-दी-चादर श्री गुरू तेगबहादूरसाहिबजी यांच्या शौर्य आणि बलिदानाला नमन करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. देशातील संस्कृती वाचवि्यासाठी आमच्या गुरूंनी हे बलिदान दिले आहे. गुरू तेगबहादूर यांनी धर्म संकल्पाचे पालन केले जबाबदारीचे पालन करताना गुरू तेगबहादूर यांना औरंगजेबाने कैद केले. त्यांना एकतर धर्म बदला किंवा मरण्यासाठी तयार राहा, असे सांगितले. या क्रूरतेसमोर गुरुजी न घाबरता आपले विचार आणि सनातन धर्माच्या संकल्पाचे पालन केले. त्यांच्यासोबत भाई सत्यदास, मतिदास आदींना मारण्यात आले, काहींचे तुकडे केले गेले. कोणाला गरम पाण्यात टाकण्यात आले. त्यानंतर गुरुजींचे शीर कापण्यात आले. यातून जे आमचे ऐकणार नाहीत त्यांचे असेच हाल होणार, हा संदेश देण्यात आला. मात्र, औरंगजेबाला हे माहीत नव्हते की, गुरुजींच्या बलिदानामुळे संपूर्ण देशांतर्गत प्रतिबद्धता निर्माण होईल. त्याचे इरादे कधीच पूर्ण होणार नाहीत, असेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले. सर्वांना जोडणारा विचार : धर्माच्या रक्षणासाठी लढत राहिले औरंगजेबाने जाहीर केले होते की, गुरुजींना अंतिम संस्कार कोणीही देणार नाही. दिल्लीच्या चांदणी चौकात गुरुदेवचे शीर पडले होते. लखीशा बंजाराजीने त्यांचे शरीर अंतिम संस्कारासाठी नेले. त्यानंतर दहावे गुरू गुरू गोविंदसिंघजी यांच्या दोन मुलांना पहिल्यांदा मारण्यात आले. त्यानंतर दोन मुलांना भिंतीमध्ये गाडण्यात आले. अशाही परिस्थितीत त्यांच्या मुलांनी आणि गुरुजींनी हार मानली नाही. धर्माच्या रक्षणासाठी लढत राहिले. हा इतिहास वीरता आणि शौर्याचा आहे. हा इतिहास शीख पंथापर्यंत मर्यादित न राहता भारतातील प्रत्येकाला माहीत झाला पाहिजे. आमच्या गुरूंनी केवळ शिखांसाठी बलिदान केले नाही तर संपूर्ण मानवतेसाठी दिले आहे. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नानक नामलेवा समाज एकत्र आला आहे. देशात जेव्हा समाज विखुरला होता तेव्हा गुरुनानक यांनी सर्वांना जोडणारा एक विचार दिला. शीख, सिखलीकर, लुभाना, सिंधी, बंजारा समाज एकत्र आला आहे. वारकरी समाजालाही जोडण्याचे काम केले. दुसऱ्या दिवशीही भाविकांची अलोट गर्दी रविवारी दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. देशातील विविध राज्यांतून आलेल्या सर्व धर्मांच्या भाविकांनी शांतता, शिस्त आणि श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक आणि सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही या कार्यक्रमासाठी उपस्थिती राहणार होती, परंतु अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. आयोजकांनी चांगली व्यवस्था केली होती.
इम्तियाज जलील हे निजामाचे पूर्वज आहेत. या राज्यात अशांतता कशी पसरेल हे त्यांचेलक्ष्य आहे. मुंब्रा येथील नगरसेविकेने तिच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. मात्र, इम्तियाज तेथे जाऊन तेल टाकत आहेत. दरम्यान, महापालिका निवडणुकीत शिवसेनेला जे अपयश आले त्याची परतफेड ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यश मिळवून करणार आहे. त्यामुळे निकालानंतर सर्वत्र शिवसेना पाहायला मिळेल, असा दावा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. एमआयएमचे काही नगरसेवक निवडून आले ते ठीक आहे. मात्र, इम्तियाज यांनी मुंब्रा येथे जाऊन पुन्हा वाद निर्माण केला आहे. हा छत्रपती शिवराय, राज्यात जातीय रंग द्यायचा प्रयत्न होत आहे. आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मुलीने माफी मागितली. मात्र, लगेच भूमिका बदलून हिंदुस्तान-पाकिस्तान ची भाषा करत आहे. इतकी मस्ती असेल तर पाकिस्तानात जा. येथे द्वेष पसरवू नका. याचे परिणाम तुम्हाला भोगावेलागतील. खासदार, आमदारकीच्यानिवडणुकीत आपण पराभूत झालोआहोत हे त्यांनी लक्षात ठेवलेपाहिजे, असा टोलाही त्यांनीलगावला. दरम्यान, संजय राऊतयांनी सरन्यायाधीशांच्यास्वागताबाबत केलेल्या टीकेबाबतशिरसाट म्हणाले की, राऊत यांनासंस्कृती आणि प्रोटोकॉल माहितीनाही. पैठणमधून दत्ता गोरडे आमचा विरोधकच पैठणमधून दत्ता गोरडे यांच्या आईभाजपकडून निवडणूक लढवतआहेत. याबाबत शिरसाट म्हणालेकी, दत्ता गोरडे आमचे विरोधकउमेदवार आहेत. त्यांना यानिवडणुकीत आम्ही पराभूत करू.विधानसभा नगराध्यक्षपदाच्यानिवडणुकीत आम्ही पराभव केलाआहे. येथेही त्यांचा पराभव होईल. भाजपचे काही ठिकाणी घाणेरडे राजकारण शिरसाट म्हणाले की, काही ठिकाणीभाजपने घाणेरडे राजकारण केलेआहे. त्याचा परिणाम युतीवर होतआहे. शिवसैनिक वैतागत असेल तरत्याचे परिणाम चांगले होणार नाहीत.धाराशिवच्या ए, बी फॉर्म वाटपघोळातल्या प्रकरणात आम्ही देवेंद्रफडणवीस तक्रार करणार आहोतअसे त्यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेची सूत्रे हाती घेण्यासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच आता भाजपमध्ये महापौरपदाच्या उमेदवारीसाठी अंतर्गत गटबाजी आणि लॉबिंगला उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील उमेदवारालाच संधी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात असले तरी पक्षातील विविध गटांनी आपापल्या समर्थकांसाठी दिल्ली आणि नागपूरपर्यंत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधील नगरसेविका रितू तावडे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. तावडे यांच्यासाठी विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि आमदार प्रसाद लाड यांनी कंबर कसली आहे. तावडे या मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करत असून त्यांना घाटकोपर पूर्व या सुरक्षित जागेवरून निवडून आणण्यात चित्रा वाघ यांची मोठी भूमिका होती. नागपूरविरुद्ध स्थानिक नेत्यांचा जोर बोरिवलीतून ओबीसी कोट्यातून निवडून आलेल्या रीना द्विवेदी-निघुट यांच्यासाठी पक्षातील “नागपूर लॉबी’ सक्रिय झाली आहे. द्विवेदी यांना उमेदवारी मिळण्यामागे नागपूरमधील बड्या नेत्यांचा हात असल्याचे बोलले जाते. मात्र, मुंबई महापौरपद खुला प्रवर्ग (महिला) साठी आरक्षित झाल्याने ओबीसी उमेदवाराला संधी मिळेल का, याबाबत साशंकता आहे. मुंबई भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मात्र आपल्या बांद्रा पश्चिम विधानसभा क्षेत्रातील स्वप्ना म्हात्रे यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. म्हात्रे या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. ‘सामान्य’ आरक्षण असूनही भाजपचा ओबीसी कार्डावर विचार? मुंबईच्या महापौरपदाची लॉटरी “सामान्य महिला’ गटासाठी निघाली असली तरी भाजपमध्ये जातीच्या समीकरणापेक्षा आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील प्रभाव पाहिला जात आहे. एका वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले की, आरक्षण खुल्या प्रवर्गाचे असले तरी भाजप ओबीसी मतांना आकर्षित करण्यासाठी रीना द्विवेदी किंवा स्वप्ना म्हात्रे यांना संधी देऊ शकते. रितू तावडे यांच्यासाठी फील्डिंग लावणारे दरेकर आणि लाड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.
पोहरेगाव जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात
पोहरेगाव : वार्ताहर जिल्हा परिषद पोहरेगाव आणि पंचायत समिती निवाडा-पोहरेगाव गण याच्या निवडणूक प्रचाराच्या शुभारंभ रविवार २५ जानेवारी रोजी डिघोळ (ता. रेणापूर) येथील ग्रामदैवत सोमलिंगेश्वर यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेणाचे माजीं चेअरमन सर्जेराव मोरे होते तर मंचावर प्रमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, रेणाचे संचालक स्रेहल देशमुख, […] The post पोहरेगाव जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर : प्रतिनिधी सध्याच्या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासने देणा-यांनी प्रत्यक्षात बळीराजाला हतबल आणि कर्जबाजारी केले आहे. भाजपने केवळ घोषणांचा पाऊस पाडला पण विकासाच्या बाबतीत त्यांचे काम शून्य आहे, अशा शब्दांत माजी आमदार धिरज देशमुख यांनी सत्ताधा-यांवर कडाडून टीका केली. लातूर जिल्हा परिषद व पंचायत […] The post भाजपकडून केवळ घोषणांचा पाऊस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नळेगाव कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार
लातूर : प्रतिनिधी नळेगाव आणि परिसरातील शेतक-यांच्या हितासाठी जय जवान जय किसान साखर कारखाना सुरू करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ त्यासोबतच, या परिसरातील नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी त्याचबरोबर तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य […] The post नळेगाव कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महात्मा बसवेश्वरांचे विचार, तत्त्वज्ञान व कार्याचा अंगीकार महाराष्ट्रातील संतांनी केला
लातूर : प्रतिनिधी महात्मा बसवेश्वरांचे विचार, तत्त्वज्ञान आणि कार्याचा महाराष्ट्रातील संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम या मध्ययुगातील संतांच्या मांदियाळीवर प्रभाव होता, असे प्रतिपादन कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांनी केले. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्यावतीने आयोजित महात्मा बसवेश्वर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ‘महात्मा बसवेश्वर आणि महाराष्ट्रातील संत परंपरा’ या विषयावर गुंफत असताना बोलत होते. या […] The post महात्मा बसवेश्वरांचे विचार, तत्त्वज्ञान व कार्याचा अंगीकार महाराष्ट्रातील संतांनी केला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सेवा पदकाने आज ९८२ पोलिस कर्मचा-यांचा गौरव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलिस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण ९८२ अधिकारी व कर्मचा-यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील ८९ अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश असून, विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात ३१ पोलिस कर्मचा-यांना वीरता पदक, उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी […] The post सेवा पदकाने आज ९८२ पोलिस कर्मचा-यांचा गौरव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उमेदवारांचे उद्या चित्र स्पष्ट होणार
लातूर : प्रतिनिधी लातूर तालुक्यामध्ये लातूर पंचायत समितीच्या २० गणासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी होऊन १९ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले, तर १०१ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या १० गटांसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी झाली असता ९ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले, तर ६३ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत. उमेदवारांना नामनिर्देशनपत्र परत […] The post उमेदवारांचे उद्या चित्र स्पष्ट होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कॅ. शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र
सर्वोच्च सैन्य पुरस्काराने होणार गौरव नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आतंरराष्ट्रीय अवकाश केंद्राला भेट दिली होती. या दरम्यान अवकाश संशोधन केंद्रात त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून भारत सरकारने अशोक चक्र हा शांतता काळातील सर्वोच्च सैन्य सन्मान पुरस्कार जाहीर केला आहे. शुभांशू शुक्ला यांनी २६ जून २०२५ ला नासाच्या […] The post कॅ. शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांतील कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. या घोषणेत महाराष्ट्रासाठी विशेष अभिमानाची बाब म्हणजे नक्षलप्रभावित आणि अतिदुर्गम भागात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या गडचिरोली पोलिस दलाच्या 31 अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे. देशभरात जाहीर झालेल्या एकूण 121 शौर्य पदकांपैकी 31 पदके एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील जवानांना मिळाल्याने राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. जिल्ह्याच्या सीमावर्ती आणि जंगलांनी वेढलेल्या भागात पोलिस दल सतत नक्षलवाद्यांच्या धोक्याखाली कार्यरत असते. अशा कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या जवानांचे मनोबल या पुरस्कारामुळे निश्चितच उंचावले आहे. जंगलातील चकमकी, दुर्गम भागातील शोध मोहिमा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येणाऱ्या कारवायांमध्ये गडचिरोली पोलिस दलाने वेळोवेळी धाडस दाखवले आहे. याच शौर्याची आणि समर्पित सेवेची दखल घेत केंद्र सरकारकडून हे सन्मान जाहीर करण्यात आले आहेत. 22 एप्रिल 2018 हा दिवस गडचिरोली पोलिस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. भामरागड तालुक्यातील बोरीया–कसनासूर या घनदाट जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली होती. या एका मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेत गडचिरोली पोलिसांनी 40 नक्षलवाद्यांना ठार करत ऐतिहासिक यश मिळवले होते. नक्षलवादाविरोधातील आतापर्यंतच्या कारवायांमधील ही सर्वात मोठी आणि निर्णायक कारवाई मानली जाते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि प्रचंड जोखमीच्या परिस्थितीत ही मोहीम यशस्वी करण्यात आली होती. या धाडसी कारवाईत प्रत्यक्ष शौर्य गाजवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या कामगिरीची आता राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. या मोहिमेत सहभागी असलेले पोलिस निरीक्षक अमोल फडतरे, पोलिस उपनिरीक्षक मधुकर नैताम, वासुदेव मडावी, विलास पोरतेट, संतोष नैताम यांच्यासह एकूण 31 जवानांना पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे. या सन्मानामुळे नक्षलविरोधी लढ्यात सहभागी असलेल्या प्रत्येक जवानाचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला असून, त्यांच्या कार्याला देशपातळीवर मान्यता मिळाली आहे. शौर्य पदकांसोबतच पोलिस दलात मोठ्या प्रमाणात पदोन्नती जाहीर करण्यात आल्या आहेत. एकूण 394 पोलिस अंमलदारांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पदोन्नती देण्यात आली आहे. कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या 14 शहीद जवानांचाही मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये 7 हवालदारांना सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर, तर 7 पोलिस नाईकांना पोलिस हवालदार पदावर मरणोत्तर पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय विशेष कामगिरी करणाऱ्या 10 जवानांना वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली असून, त्यात 82 हवालदारांना सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून आणि 303 पोलिस नाईकांना पोलिस हवालदार म्हणून बढती देण्यात आली आहे. दरम्यान, भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील पोलिस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांमधील एकूण 982 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदक जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 89 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या कर्तव्यदक्षतेचा आणि सेवाभावाचा सन्मान म्हणून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील पोलिस दलामध्ये समाधान आणि अभिमानाचे वातावरण आहे. पोलिस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे यांना राष्ट्रपती पदक या यादीत भंडारा जिल्ह्यालाही मानाचा सन्मान मिळाला आहे. भंडाऱ्यातील राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल (MSM) राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. घुमरे हे भंडारा जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रपती पदक विजेते पोलिस उपनिरीक्षक ठरले आहेत. 1991 च्या बॅचचे पोलिस अंमलदार असलेल्या घुमरे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात गुप्त वार्ता विभागात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली असून, त्यांच्या कार्याची दखल आता थेट राष्ट्रपती स्तरावर घेण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून देशातील कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा, आरोग्य आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. उद्या नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. यंदाच्या यादीत पाच राजकीय नेत्यांचा समावेश असून महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला असून शिवसेना ठाकरे गटाने या पुरस्काराला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरून आपली प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपवर थेट आरोप केले. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला, अशा व्यक्तीला पद्मभूषण देऊन सन्मानित केलं जात आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करते, छान! अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. राऊत यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून भाजप आणि ठाकरे गटामध्ये नव्या वादाची ठिणगी पडली आहे. संजय राऊत यांनी आपल्या टीकेमध्ये केंद्र सरकारवर आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपचे सरकार सत्तेत बसवण्यात आलं. या प्रक्रियेत ज्यांची भूमिका होती, त्यांनाच मोदी सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, असे राऊत म्हणाले. तसेच, अशा व्यक्तीला राष्ट्रीय पुरस्कार देणे म्हणजे महाराष्ट्राच्या भावना दुखावण्यासारखे असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. त्यांच्या मते, हा पुरस्कार केवळ सन्मान नसून तो एका विशिष्ट राजकीय भूमिकेचा पुरस्कार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी 2019 ते 2023 या कालावधीत महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या कार्यकाळात राज्यातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल म्हणून घेतलेल्या भूमिकेमुळे ते सातत्याने चर्चेत होते. तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी त्यांनी राज्यपाल म्हणून शपथ दिली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले, तेव्हाही भगतसिंह कोश्यारी हेच महाराष्ट्राचे राज्यपाल होते. राज्यपालपदाच्या काळात भगतसिंह कोश्यारी यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता. यापूर्वी ते उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री राहिले असून केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. दीर्घ राजकीय कारकिर्दीमुळे ते राष्ट्रीय राजकारणात ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व आहेत. मात्र, त्यांच्या काही वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. वादग्रस्त विधानांमुळे राज्यभर संतापाची लाट विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बालविवाहासंदर्भातील अवमानकारक टिप्पणीमुळे विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता. त्या काळात त्यांच्या राजीनाम्याचीही जोरदार मागणी करण्यात आली होती. या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता अशा पार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने पुन्हा एकदा तोच वाद नव्याने उफाळून आला आहे. संजय राऊत यांच्या आक्रमक प्रतिक्रियेमुळे हा विषय अधिक तापला असून आगामी काळात या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे. पद्म पुरस्कारासारख्या सन्मानावरून निर्माण झालेला हा वाद केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक संवेदनांशी जोडला गेल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
राज्यातील महामार्गांवर अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. दररोज वर्तमानपत्रे आणि माध्यमांमधून भीषण अपघातांच्या बातम्या समोर येत असून त्या मन सुन्न करणाऱ्या आहेत. अशाच एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या अपघाताची घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी परिसरात दुचाकी आणि भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भीषण धडकेत आजोबा आणि त्यांचा अवघ्या सहा वर्षांचा नातू जागीच ठार झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्दैवी घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील बायपासवरील कढोली फाट्याजवळ घडली. देशमुख चुनीलाल राठोड हे आपली पत्नी बेबीबाई राठोड आणि नातू परेश राठोड यांच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करत होते. नुकत्याच खरेदी केलेल्या कारच्या कागदपत्रांच्या कामासाठी ते जळगावला आले होते. काम पूर्ण करून तिघेही दुचाकीने आपल्या गावी परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की आजोबा आणि नातवाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात बेबीबाई राठोड या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीचा चालक घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली. मात्र, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चालकाला ताब्यात घेतले असून ट्रॅक्टर ट्रॉलीसह त्याला पाळधी पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच जळगाव जिल्हा रुग्णालयात नातेवाईक आणि गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे दृश्य पाहून वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
टीम इंडियाचा न्यूझीलंडला मालिकेत धोबीपछाड
गुवाहाटी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीचे तीन सामने जिंकून भारताने मालिका खिशात घातली आहे. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी १५४ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने १० षटकांत फक्त २ गडी गमवून पूर्ण केले. अभिषेक शर्माने नाबाद ६८ धावा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद ५७ धावांची […] The post टीम इंडियाचा न्यूझीलंडला मालिकेत धोबीपछाड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर येथील बालाजीनगर परिसरात माहेश्वरी अन्नकुट ग्रुपच्या वतीने प्रभाग क्रमांक 20 आणि 21 मधील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या लोकप्रतिनिधींना समाजाच्या वतीने सन्मानित करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हा सत्कार सोहळा बालाजीनगरमधील अशोक भुतडा यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माहेश्वरी समाजाच्या परंपरेनुसार नवनिर्वाचित नगरसेवकांचा राजस्थानी पगडी, शाल, श्रीफळ, हार, पुष्पगुच्छ आणि पेढे देऊन गौरव करण्यात आला. प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेवक गणेश नांवदर, त्रिंबक तुपे, जालिंदर शेंडगे, अनिता मानकापे आणि अर्चना निळकंठ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर प्रभाग क्रमांक 21 मधील नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, नंदकिशोर गवळी, सुमित्रा मात्रे आणि कमल थोरात यांनाही सन्मानित करण्यात आले. सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या सोहळ्यास उपस्थित होते. सत्कारप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नगरसेवकांच्या विजयाबद्दल समाधान व्यक्त करत, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. समाजाच्या विकासासाठी आणि परिसराच्या प्रगतीसाठी सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे काम करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. माहेश्वरी अन्नकुट ग्रुप समाज नेहमीच सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माहेश्वरी अन्नकुट ग्रुपचे राजेंद्र मुंदडा, बस्तीराम चांडक, द्वारकादास बाहेती, शिवप्रसाद मुंदडा, अशोक भुतडा, महेश राठी, गणेश हेडा, अॅड. संतोष मालपणी आणि विजयकुमार लाहोटी यांनी विशेष परिश्रम घेतले. या सत्कार सोहळ्यास माहेश्वरी समाजासह इतर समाजातील अनेक नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे आणि सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले.
राष्ट्र उभारणीत महिलांची महत्त्वाची भूमिका
नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला रविवारीदेशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात त्यांनी गेल्या वर्षी देशाच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. त्यांनी देशाच्या मुलींच्या कामगिरीचे कौतूक केले असून राष्ट्र उभारणीत महिलांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगत तरुण देशाला दिशा देत असल्याचे म्हटले जात […] The post राष्ट्र उभारणीत महिलांची महत्त्वाची भूमिका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रोहित शर्मा, हरमनप्रीत कौरचा पद्मश्रीने गौरव
नवी दिल्ली : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने नागरी पुरस्कारांची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाची वर्ल्ड कप विजेती कॅप्टन जोडी रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांच्यासह लोकप्रिय अभिनेता आर. माधवन यास २०२६ चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्मा आणि महिला संघाची धडाकेबाज कर्णधार हरमनप्रीत कौर […] The post रोहित शर्मा, हरमनप्रीत कौरचा पद्मश्रीने गौरव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंद-दी-चादर गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते.त्यांचे बलिदान आपल्याला सत्य, धर्म आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी निर्भीडपणे उभे राहण्याची प्रेरणा देते. त्यामुळेच त्यांचे विचार राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित 'हिंद दी चादर' श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, गुरू तेग बहादुर साहिबजी यांनी दिलेले बलिदान हे केवळ शीख धर्मासाठी नव्हते, तर या देशाची संस्कृती, सभ्यता, विचारधारा आणि धर्म यांच्या रक्षणासाठी होते. त्यांचा पराक्रम, वीरता, शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने समाज नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत एकत्र आला आहे. गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या बलिदानामुळे संपूर्ण देशात धर्म, स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानासाठी लढण्याची नवी चेतना निर्माण झाली. त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहचावा, यासाठी शहीदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून प्रत्येक गावात, वाड्या-वस्त्यांवर जावून श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शीख गुरूंचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. श्री गुरु नानक देवजींना मानणारा, त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारा सर्व समाज एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. देशाच्या विपरीत परिस्थितीत श्री गुरु नानक देवजींनी एकत्र बांधणारा, भेदाभेद नष्ट करणारा महान विचार दिला आहे. त्या विचारांनी संपूर्ण देशात विविध समाजांना जोडण्याचे काम केले. हा विचार घेवून सर्व समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे.संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील महान संत होते. त्यांची समाधी पंजाबमधील घुमान येथे आहे. संत नामदेवांनी मांडलेले विचार, त्यांचे अभंग आणि पंक्ती यांना श्री गुरु ग्रंथ साहिबमध्ये स्थान मिळाले आहे. त्यांचे विचार गुरुबाणीचा अविभाज्य भाग बनले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील वारकरी परंपरा आणि शीख समाज यांच्यातील अनोखे, अतूट नाते अधिक दृढ झाले आहे. श्री गुरु गोविंद सिंघ महाराजांच्या दीर्घकाळ वास्तव्याने नांदेडची भूमी पावन झाली आहे. या भूमीने सामाजिक सलोखा अधिक मजबूत करण्याचे काम केले असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मानवी सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी बलिदान - अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचे बलिदान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवी सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी होते. जुलमी शासकांच्या दमनकारी धोरणांविरुद्ध विचार स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी दिलेले गुरु तेग बहादुरजी यांचे बलिदान हे अभूतपूर्व ऐतिहासिक उदाहरण असून, त्यांच्या निर्भय आचरणातून धार्मिक व नैतिक दृढतेचा आदर्श मिळतो, असे त्यांनी सांगितले. धर्मतत्त्वज्ञान जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी गुरु तेग बहादुर साहिब जी यांनी देशभर प्रवास करून आध्यात्मिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी रचनात्मक कार्य केले. अंधश्रद्धा व अपप्रथांविरुद्ध त्यांनी प्रबोधन केले, तसेच विहिरी खोदणे, धर्मशाळा उभारणे, दानधर्म व प्राणीसेवा यांसारखी सार्वजनिक कल्याणाची कामे केली, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. सामर्थ्यासोबत सद्भाव जपण्याचा संदेश - पवन कल्याण आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी आपल्या भाषणाला मराठी भाषेत सुरुवात करत महाराष्ट्रात पुन्हा येऊन आनंद झाल्याचे सांगितले. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या स्मरणासाठी होणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरेल,असे ते म्हणाले. गुरू तेग बहादूर जी यांच्या जीवनाचा आदर्श घेत युवकांनी देशाला नव्या उंचीवर घेवून जाण्याचा, तसेच देशाला अखंडीत ठेवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासातून सामर्थ्यासोबत सद्भाव जपण्याचा संदेश महाराष्ट्राने दिला आहे, असा उल्लेखही श्री. कल्याण यांनी केला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) क्रीडावर्धिनी आणि कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मएसो क्रीडा करंडक २०२६’ या राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मएसो ज्ञानमंदिर कळंबोली या शाळेने पटकावले. यासह ही शाळा फिरत्या करंडकाचीही मानकरी ठरली. या स्पर्धेचे हे १४ वे वर्ष होते. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ही तीन दिवसीय निवासी क्रीडा स्पर्धा बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड येथे पार पडली. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तेजल हसबनीस यांच्या हस्ते रविवारी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी 'मएसो'चे उपाध्यक्ष प्रदीप नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी 'मएसो'च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, क्रीडावर्धिनी व शाला समितीचे अध्यक्ष विजय भालेराव, 'मएसो'चे सचिव अतुल कुलकर्णी, सहसचिव सुधीर भोसले, शाला समिती महामात्र डॉ. नेहा देशपांडे, मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी, मंजुषा दुर्वे, सायली देशमुख यांच्यासह संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते. तेजल हसबनीस यांनी यावेळी बोलताना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून क्रीडासंस्कृती रुजवण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात. यातून त्यांच्यात संघभावना, शिस्त, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्ती विकसित होते. चांगला माणूस घडवण्यासाठी खेळांतून प्रोत्साहन मिळते. अध्यक्षीय मनोगतात प्रदीप नाईक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भविष्यात यातील काही विद्यार्थी ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील वर्षीचा 'मएसो क्रीडा करंडक' पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके महाविद्यालय येथे आयोजित केला जाईल, अशी घोषणा विजय भालेराव यांनी केली. कार्यक्रमाचे स्वागत-प्रास्ताविक बाबासाहेब शिंदे यांनी केले. डॉ. वैशाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर मंजुषा दुर्वे यांनी आभार प्रदर्शन केले.
आधुनिक जीवनशैलीत आयुर्वेदाचे महत्त्व वाढले असून, त्याला जागतिक स्तरावर ओळख मिळत आहे, असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांनी केले. भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय आयुर्वेद संभाषा परिषद आणि राज्यस्तरीय धन्वंतरी पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. राज्यपाल खान म्हणाले की, आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून, ती एक भारतीय जीवनदृष्टी आहे. जागतिक पातळीवर आयुर्वेदाला अधिक विश्वासार्हता मिळवून देण्यासाठी संशोधन, प्रमाणबद्धता आणि वैज्ञानिक दस्तऐवजीकरणावर भर देणे आवश्यक आहे. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या डॉ. शिरामाने सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. राज्याच्या आरोग्य शिक्षण विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी आयुर्वेद क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वैद्य रणजीत पुराणिक, वैद्य जीवन बच्छाव (आयआरएस), वैद्य संतोष नेवपूरकर, वैद्य प्रशांत बागेवाडीकर, वैद्य वंदना सिरोहा, वैद्य अनिल बनसोडे, वैद्य प्रियदर्शिनी कडूस आणि वैद्य किरण पंडित यांना 'आयुर्वेद गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या परिषदेदरम्यान, विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. वैद्य किरण पंडित यांनी आयुर्वेद शिक्षण व्यवस्था, तिची व्याप्ती आणि राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. विश्वानंद आयुर्वेद चिकित्सालय व गुरुकुलचे संचालक वैद्य अनिल बनसोडे यांनी 'आयुर्वेद प्रॅक्टिस कशी उभारावी व वाढवावी?' यावर प्रात्यक्षिकांसह विश्लेषण केले. श्री आयुर्वेद अँड हॉस्पिटलचे संचालक वैद्य प्रशांत दौंडकर-पाटील यांनी 'आयुर्वेद ओपीडी, हॉस्पिटल नोंदणी, ओपीडी व आयपीडी पंचकर्मासाठी कॅशलेस मेडिक्लेम एम्पॅनेलमेंट' याविषयी मार्गदर्शन केले. श्री धूतपापेश्वरचे सीईओ वैद्य रणजीत पुराणिक, आयुर्वेद व्यासपीठाचे माजी अध्यक्ष वैद्य संतोष नेवपूरकर, बागेवाडीकर आयुर्वेद रसशाळेचे संचालक वैद्य प्रशांत बागेवाडीकर आणि आयुष मंत्र्यांचे खासगी सचिव वैद्य जीवन बच्छाव यांनीही आपले विचार मांडले. या मान्यवरांनी आयुर्वेद क्षेत्राचा आजवरचा प्रवास, आधुनिक वैद्यक शास्त्रात आयुर्वेदाची भूमिका, वैद्यांसमोरील आव्हाने व अडचणी, तसेच विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेद क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या जागतिक पातळीवरील विविध संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले. वैद्य हरीश पाटणकर आणि वैद्य प्रेरणा बेरी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांनी पुढे सांगितले की, शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी आयुर्वेदाची संकल्पना आजच्या तणावपूर्ण काळात अत्यंत उपयुक्त ठरत आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेत आयुर्वेदाची भूमिका भविष्यात निर्णायक ठरू शकते. त्यामुळे आधुनिक विज्ञानाशी समन्वय साधत आयुर्वेदातील मूलतत्त्वे जपण्याची गरज असून, तरुण वैद्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत संशोधनाकडे वळावे.
पुण्यात पाषाण रस्त्यावर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या प्रवेशद्वारासमोर भरधाव वाहनाच्या धडकेत एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे. फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या या महिलेला धडक दिल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. आशा विजयकुमार पाटील (वय ७३, रा. अभिमानश्री हाऊसिंग सोसायटी, पाषाण रस्ता) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अतुल विजयकुमार पाटील (वय ५२) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा पाटील दररोज सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडत असत. पाषाण रस्त्यावरून जात असताना राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) प्रवेशद्वारासमोर त्यांना भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध सुरू आहे. दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा परिसरातही एका पादचारी तरुणाचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. २३ जानेवारी रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. तो सुमारे ३५ वर्षांचा असावा असा अंदाज आहे. या प्रकरणीही अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरही एका भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर मोटार आदळल्याने हा अपघात झाला. भीमा राजेंद्र जाधव (रा. धायरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मोटारचालक शुभम सुनील डुबळे (वय २७, रा. धायरी) याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम आणि भीमा हे दिवे घाटातील श्री कानिफनाथ मंदिरातून दर्शन घेऊन परतत होते. शनिवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास आंबेगाव परिसरातील बाबाजी पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला त्यांच्या मोटारीने धडक दिली. ट्रकचालकाने पाठीमागील दिवे सुरू न ठेवल्याने अंधारात ट्रक दिसला नाही. या अपघातात शुभम जखमी झाला, तर भीमाचा गंभीर दुखापतींमुळे मृत्यू झाला. ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुणे शहरातील लोहगाव येथील हवाई दलाच्या तळाच्या आवारात बेकायदा प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवाई दलाच्या भिंतीवरून चढताना तो पडल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली. या प्रकरणी हवाई दलातील कनिष्ठ अधिकारी प्रदीपकुमार सिंह (वय ४७) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, एका २५ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरील टाटा गार्ड रुम परिसरात हवाई दलाची जागा आहे. लोहगाव येथील हवाई दलाच्या तळाचा हा भाग असून, हवाई दलातील अधिकारी, कर्मचारी वगळता अन्य नागरिकांना या भागात प्रवेश करण्यास मनाई आहे. २२ जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास हा तरुण टाटा गार्ड रुम परिसरातील भिंतीवर चढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी गस्त घालणाऱ्या हवाई दलातील कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिले आणि ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. भिंतीवरून चढताना पडल्याने तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाला. त्याला हवाई दलाच्या रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. हवाई दलाच्या तळाच्या आवारातील अंतर्गत भागाची उत्सुकतेपोटी माहिती घेण्यासाठी तो भिंतीवर चढला होता, असे तरुणाने अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र हवाई दलाच्या जागा या संरक्षित असल्याने त्या ठिकाणी इतरांना प्रवेश निषिद्ध आहेत. त्यामुळे तरुणाने केलेले कृत्य हे कायद्याचे उल्लंघन होते. भारतीय न्यायसंहिता कलम ३२९ (३) अन्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पंधरा दिवसांपूर्वीही हवाई दलाच्या जागेत बेकायदा प्रवेश करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिवसेनेचे पक्ष निरीक्षक राजन साळवी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, त्यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये चुकीचे तिकीट वाटप झाल्याचा आरोप करत संतप्त शिवसैनिकांनी राजन साळवी यांचा घेराव घातल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याच्या रागातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळत असून, या प्रकारामुळे धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. याआधी राजन साळवी यांच्याबाबत एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्या ऑडिओमध्ये शिवसेनेचे एबी फॉर्म भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि मल्हार पाटील यांना दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या ऑडिओ क्लिपनंतर राजन साळवी यांच्यावर टीकेची झोड उठली होती. आता त्यातच शिवसैनिकांनी घेराव घातल्याचा दुसरा व्हिडिओ समोर आल्याने प्रकरण अधिकच चिघळले आहे. या सर्व घडामोडींमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील तिकीट वाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये शिवसैनिक राजन साळवी यांच्याशी थेट जाब विचारताना दिसत आहेत. तिकीट नसेल तर आम्हाला चादर आणि सतरंजी आणून द्या, आम्ही निवांत झोपतो, अशी खोचक आणि संतप्त मागणी करत शिवसैनिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. या वाक्यामुळे शिवसैनिकांचा रोष किती तीव्र आहे, हे स्पष्ट होते. तिकीट न मिळाल्याने आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारल्याने आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी भावना शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. या दरम्यान राजन साळवी आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचेही व्हिडिओत दिसून येते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या किंवा इतर पक्षाशी संबंधित व्यक्तींना प्राधान्य दिल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. विशेषतः भाजपच्या आमदारांना शिवसेनेचे एबी फॉर्म देण्यात आल्याचा आरोप झाल्याने संताप अधिकच वाढला आहे. या मुद्यावरूनच शिवसैनिक आणि राजन साळवी यांच्यात तीव्र वाद झाला. शिवसेनेत तिकीट वाटपावरून असंतोष या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीचा आणि नाराजीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. निवडणुकीच्या तोंडावरच निष्ठावंत शिवसैनिक रस्त्यावर उतरत असल्याने पक्ष नेतृत्वासाठी ही बाब डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. राजन साळवी यांच्यावरील आरोपांबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नसले, तरी व्हायरल व्हिडिओंमुळे शिवसेनेत तिकीट वाटपावरून असंतोष उफाळून आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बांगलादेशातील सर्व सूत गिरण्या बंद?
ढाका : बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला वस्त्रोद्योग सध्या एका मोठ्या संकटात सापडला आहे. बांगलादेश टेक्सटाईल मिल्स असोसिएशनने १ फेब्रुवारी २०२६ पासून देशातील सर्व सूत गिरण्या अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. भारताकडून होणा-या शुल्कमुक्त धागा आयातीमुळे स्थानिक उद्योगांना मोठा तोटा सहन करावा लागत असल्याचा आरोप गिरणी मालकांनी केला आहे. बांगलादेशमधील तयार कपडे निर्यातदार भारताकडून […] The post बांगलादेशातील सर्व सूत गिरण्या बंद? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी भाषा शहीद दिनानिमित्त केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यासाठी पूर्वीही जागा नव्हती, आज ही नाही आणि भविष्यात कधीही नसेल, अशा कडक शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. १९६० च्या दशकातील ऐतिहासिक हिंदी विरोधी आंदोलनातील आंदोलकांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी राज्याची भाषिक अस्मिता […] The post तामिळनाडूत हिंदीला थारा नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरची वाढती ताकद आणि भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतल्याने रुपया प्रति डॉलर ९२ रुपयांच्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. रुपयाच्या या घसरणीमुळे देशांतर्गत महागाईचा भडका उडण्याची दाट शक्यता असून, आयातदार, विद्यार्थी आणि पर्यटकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. जानेवारी २०२६ या एकाच महिन्यात रुपया २ टक्क्यांहून अधिक (२०२ […] The post रुपया विक्रमी कमकुवत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राजदच्या कार्यकारी अध्यक्षपदी तेजस्वी यादव
पाटना : राष्ट्रीय जनता दलाचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून तेजस्वी यादव यांची निवड झाली आहे. आज पाटणा येथे राजदच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि मीसा भारती यांच्यासह पक्षाचे जवळजवळ सर्व मोठे नेते उपस्थित होते. बैठकीदरम्यान, राजदचे बिहार प्रदेश अध्यक्ष मंगणी लाल मंडल यांनी याची घोषणा […] The post राजदच्या कार्यकारी अध्यक्षपदी तेजस्वी यादव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ज्येष्ठ पत्रकार मार्क टली यांचे निधन
नवी दिल्ली : प्रख्यात ब्रिटीश पत्रकार आणि लेखक मार्क टली यांचे रविवारी नवी दिल्लीत निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते आणि दिल्लीतील साकेत येथील मॅक्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे निकटवर्तीय आणि ज्येष्ठ पत्रकार सतीश जेकब यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. २४ ऑक्टोबर १९३५ रोजी कोलकात्यात […] The post ज्येष्ठ पत्रकार मार्क टली यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ला करण्यासह सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या हत्तेची धमकी दिल्यानंतर धास्तावलेल्या इराणकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या धमकीनंतर खामेनी यांनी जीव वाचविण्यासाठी तेहरानमधील बंकरचा आसरा घेतला आहे असे वृत्त इराणमधील माध्यमांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेच्या धमकीनंतर खामेनी तेहरानमधील बंकरमध्ये […] The post अमेरिका हल्ला करण्याची भीती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कितीही अत्याचार केले तरी मागे हटणार नाही
प्रयागराज : प्रयागराजमध्ये शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि मेळा प्रशासनामध्ये गेल्या ७ दिवसांपासून वाद सुरू आहे. शिबिरात तरुणांनी केलेल्या गोंधळावर अविमुक्तेश्वरानंद यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आमच्यावर हल्ला यासाठी करण्यात आला आहे, कारण आम्ही गो-रक्षणाची गोष्ट करत आहोत. आम्ही यांच्या (भाजपच्या) डोळ्यात खुपत आहोत, कितीही त्रास दिला तरी, मी मागे हटणार नाही. जितका आमच्यावर […] The post कितीही अत्याचार केले तरी मागे हटणार नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
टोल टॅक्समध्ये ७० टक्केपर्यंत सूट
नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी असून सरकारने टोल टॅक्सच्या नियमांत बदल केले असून त्याअंतर्गत आता ७० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. एनएचएआयच्या नवीन नियमानुसार, दोन पदरी राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना टोल टॅक्समध्ये ७० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच प्रवाशांना आता केवळ ३० टक्के टोल भरावा […] The post टोल टॅक्समध्ये ७० टक्केपर्यंत सूट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमेरिकेने जीवे मारण्याची धमकी दिली होती
कराकस : व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांनी खळबळजनक दावा केला आहे. जेव्हा देशाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकन सैनिकांनी पकडले, तेव्हा त्यांना आणि त्यांच्या सहका-यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांनी आम्हाला उत्तर देण्यासाठी फक्त १५ मिनिटांचा वेळ दिला होता, अन्यथा त्यांनी आम्हाला मारून टाकले असते असे म्हटले आहे. अमेरिकेने त्यांच्या कॅबिनेटला […] The post अमेरिकेने जीवे मारण्याची धमकी दिली होती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दादा लाड यांना पद्मश्री पुरस्कार
परभणी : कापूस पिकासंदर्भात स्वत:चे तंत्रज्ञान विकसित करून असंख्य शेतक-यांना या तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देणारे ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ श्रीरंग देवबा लाड उर्फ दादा लाड यांना भारत सरकारने पद्मश्री हा नागरी सन्मान जाहीर केला आहे. नुकतीच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठानेही त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही सन्माननीय पदवी बहाल केली आहे. देशपातळीवर मानाचा समजला जाणारा पद्मश्री […] The post दादा लाड यांना पद्मश्री पुरस्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची धार वाढली असून, शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यात जोरदार शाब्दिक संघर्ष रंगला आहे. विजय शिवतारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केल्यानंतर हा वाद अधिक चिघळला. शिवतारेंच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले असून, त्यांनी शिवतारेंवर जोरदार पलटवार केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. विजय शिवतारे यांनी आपल्या टीकेत शरद पवार आणि अजित पवार यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीवर बोट ठेवले होते. शरद पवार यांनी चार वेळा मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी पाच वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहिले. या काळात त्यांनी राज्यातील अनेक देवस्थानांना देणग्या दिल्या, मात्र पुरंदर तालुक्यातील खंडोबा मंदिर आणि त्या परिसराच्या विकासाकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही, असा आरोप शिवतारेंनी केला. त्यांनी पुरंदरच्या विकासाबाबत दुर्लक्ष झाल्याचा थेट आरोप करत पवार कुटुंबावर टीकेची झोड उठवली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनी अत्यंत कठोर शब्दांत विजय शिवतारे यांच्यावर निशाणा साधला. तीन वेळा आमदारकी आणि पाच वर्षे मंत्रीपद भूषवूनही स्वतःच्या मतदारसंघाचा विकास करता न आलेल्या आमदाराला आदरणीय पवार साहेब आणि अजितदादा यांच्यावर टीका करण्याची राजकीय पात्रता आहे का, हे आधी तपासायला हवं, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. शिवतारेंनी केलेली टीका ही त्यांच्या स्वतःच्या कामगिरीवर पडलेली पांढरी फाशी असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. रोहित पवार यांनी जेजुरी गडाच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करत शिवतारेंच्या आरोपांना उत्तर दिले. श्रीक्षेत्र जेजुरी गडासाठी अर्थसंकल्पात घोषणा करून 350 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्याचे काम अजित पवार यांनीच केले, हे शिवतारे विसरले असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. त्यामुळे विकासासाठी निधी दिला नाही, हा आरोप पूर्णपणे चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टीका करताना शिवतारेंनी जिभेला लगाम लावावा, अन्यथा पोपटासारखं मिठू.. मिठू बोलणाऱ्यांचं पुढे काय होतं, याचा अनुभव त्यांना आधीच आलेला आहे, असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला. रोहित पवार यांनी पुढे म्हटले की, विजय शिवतारे यांनी आज जी टीका केली आहे, ती प्रत्यक्षात त्यांच्या स्वतःच्या नाकर्तेपणाची कबुली आहे. ज्या पक्षाने त्यांना आमदारकी दिली, मंत्रीपद दिलं, त्याच पक्षाला त्यांनी फसवलं. त्यामुळे अशा व्यक्तीकडून विकासाची अपेक्षा तरी काय करायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवतारेंनी केलेली वक्तव्ये ही केवळ राजकीय अस्वस्थतेतून आलेली असून, त्याला कोणताही ठोस आधार नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. नेतेच दळभद्री, असे आक्षेपार्ह विधान केल्याने वाद दरम्यान, विजय शिवतारे यांनी नेमकं काय म्हटलं होतं, यावरही आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. शिवतारे यांनी आरोप करताना म्हटलं होतं की, शरद पवार आणि अजित पवार यांनी दीर्घकाळ सत्तेत असताना अनेक देवस्थानांना मदत केली, मात्र पुरंदरमधील खंडोबा मंदिर आणि त्या भागाचा विकास त्यांच्या प्राधान्यक्रमात नव्हता. टीका करताना त्यांच्या शब्दांची मर्यादा सुटली आणि त्यांनी थेट नेतेच दळभद्री, असे आक्षेपार्ह विधान केल्याने वाद अधिक पेटला. त्यांनी गेल्या पन्नास वर्षांत पुरंदर परिसराचा विकास झाला नसल्याचा दावाही केला. शाब्दिक युद्धाचे पडसाद राज्याच्या राजकारणात शिवतारे यांनी सध्याच्या काळात सुरू असलेल्या विकासकामांचा दाखला देत, आता पुरंदर परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे दुपदरीकरण आणि इतर पायाभूत सुविधा उभारल्या जात असल्याचे सांगितले. ही कामे आताच होत असल्याने, पवारांच्या कार्यकाळात या भागाकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. मात्र, या आरोपांना रोहित पवार यांनी जोरदार उत्तर दिल्याने हा वाद आणखी तीव्र झाला आहे. आता या शाब्दिक युद्धाचे पडसाद राज्याच्या राजकारणात किती दूरवर उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सध्या जोरात सुरू असून सर्वत्र उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मात्र पैठण तालुक्यातील बिडकीन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बंगला तांडा येथील ग्रामस्थांनी जीवनावश्यक व भौतिक सुविधांकडे शासन व प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.बिडकीन ग्रामपंचायत हद्दीत बंगला तांडा, बन्नी तांडा, मेहेरबान नाईक तांडा, फारोळा तांडा आदी गावे येतात. ही बहुतांशी बंजारा समाजाची वस्ती असलेली गावे असून त्यापैकी बंगला तांडा हे गाव 1960 पासून अस्तित्वात आहे. असे असतानाही आजतागायत मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले आहे की, गावातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर असून सध्या फक्त एकच बोअरवेल आहे. त्या बोअरवेलमधील पाणी पिण्यायोग्य नसल्याची माहिती पंचायत समितीला वेळोवेळी देण्यात आली आहे. तसेच गावासाठी मुख्य रस्त्याची सुविधा उपलब्ध नाही. सध्या जो रस्ता वापरात आहे, तो खासगी मालमत्तेतून जात असून याबाबत अनेक वेळा शासनदरबारी पत्रव्यवहार व आंदोलने करूनही रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही. याशिवाय गावात स्मशानभूमी असली तरी तेथे स्वच्छतेचा अभाव असून स्मशानभूमीला अद्याप गेट बसवण्यात आलेले नाही. तसेच गावठाण विस्ताराचा प्रश्न देखील प्रलंबित आहे. आंदोलनानंतर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली, मात्र ती प्रत्यक्षात पाळली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. या सर्व प्रश्नांकडे शासन व प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आणि कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. या निवेदनावर अक्षय चव्हाण, संदीप राठोड, संजय पवार, ऋषिकेश राठोड, आदित्य राठोड, विशाल राठोड, संदेश पवार आदी ग्रामस्थांच्या सह्या असून निवेदनाच्या प्रती आमदार विलास बापू भुमरे तसेच तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार याची चर्चा सुरू असतानाच, नगरसेवकांच्या पळवापळवीच्या संशयाने राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाचे ११ उमेदवार निवडणुकीत विजयी झाले आहेत, मात्र त्यापैकी चार नगरसेवक १६ जानेवारीपासून बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून आता ठाकरे गट आक्रमक झाला असून कल्याण पूर्व परिसरात या नगरसेवकांचे हरवले आहेत अशा आशयाचे पोस्टर झळकवण्यात आले आहेत. महापालिकेत आपला महापौर बसवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असताना ठाकरे गटाचे चार शिलेदार अचानक गायब झाले आहेत. बेपत्ता झालेल्या नगरसेवकांमध्ये मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नील केणे यांचा समावेश आहे. या विजयी उमेदवारांशी कोणताही संपर्क होत नसल्याने अखेर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र, तक्रार देऊनही पोलिस प्रशासन सुस्त असून, नगरसेवकांचा शोध घेण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा गंभीर आरोप पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. पोलिस आणि सत्ताधाऱ्यांवर संशयाची सुई नगरसेवकांचा शोध घेण्यात पोलिस हलगर्जीपणा करत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे. खासदार संजय राऊत यांनी यावर कडक भूमिका घेत म्हटले आहे की, आमच्या नगरसेवकांना दबावाखाली किंवा प्रलोभनाखाली पळवून नेले जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांनी तातडीने त्यांचा शोध घ्यावा, अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने कारवाई करावी लागेल. रस्त्यावर उतरले शिवसैनिक संजय राऊत यांच्या इशाऱ्यानंतर आज कल्याण पूर्व भागात ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. बेपत्ता नगरसेवकांचे फोटो असलेले पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. कुणालाही हे नगरसेवक आढळून आल्यास शिवसेना शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन या पोस्टर्सच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता एकीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, दुसरीकडे या नगरसेवकांचे कुटुंबीय आणि नातेवाईक चिंतेत आहेत. आपल्या माणसांचा जीव धोक्यात असल्याची भीती त्यांच्याकडून व्यक्त होत असून, पोलिसांनी तातडीने तपास चक्रं फिरवावीत, अशी मागणी केली जात आहे. सत्तास्थापनेच्या खेळात या नगरसेवकांचे नक्की काय झाले? ते स्वतःहून बाहेर गेले आहेत की त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे? याचा उलगडा आता पोलिस तपासातूनच होणार आहे. आता या राजकीय 'बेपत्ता' नाट्याचा शेवट कसा होतो आणि हे नगरसेवक कुणाच्या गोटात प्रकट होतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. पोलिसांकडून बेपत्ता नगरसेवकांचा तपास सुरू दरम्यान, सध्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगली आहे की, आगामी महापौर पदाच्या निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी या नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवण्यात आले असावे. कोळशेवाडी पोलिसांनी याप्रकरणी लेखी तक्रार दाखल करून घेतली आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास करत आहोत असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत महापालिकेतील सध्याची राजकीय परिस्थिती, सत्तास्थापनेचे प्रयत्न, घडत असलेला घोडेबाजार आणि पुढील भूमिका यावर सखोल चर्चा झाली. या बैठकीतून केडीएमसीत शिवसेना ठाकरे गट विरोधी बाकावर बसण्याचा ठाम निर्णय समोर आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक ही राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी निवडणुकांपैकी एक ठरली होती. भाजप महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने सुरुवातीपासूनच येथील राजकीय गणित वेगळे होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली ही निवडणूक होती. निकालानंतर महायुतीला एकूण वर्चस्व मिळाले असले, तरी शिंदे गटाच्या शिवसेनेचे सर्वाधिक 53 नगरसेवक निवडून आले. मात्र स्पष्ट बहुमतासाठी त्यांनाही इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या पाच नगरसेवकांनी शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या निर्णयामुळे समीकरणे बदलली, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे चार नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने संभ्रम वाढला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केडीएमसीतील नगरसेवकांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला. आजच्या बैठकीत नगरसेवकांनी महापालिकेत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू असल्याची तक्रार पक्षप्रमुखांकडे केली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना स्पष्ट सूचना दिल्या. पक्षाने संपूर्ण निवडणूक भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात लढवली असून, त्याच भूमिकेवर ठाम राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. नगरसेवकांनीही आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आलो असून, जनतेने आम्हाला विरोधी भूमिका निभावण्यासाठीच निवडून दिले आहे. त्यामुळे कोणत्याही सत्तास्थापनेच्या मोहाला बळी न पडता विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय आम्हाला मान्य आहे. या बैठकीनंतर आमदार वरुण सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना ठाकरे गट विरोधी बाकावर बसणार आहे. ही संपूर्ण निवडणूक आम्ही शिंदेसेना आणि भाजपविरोधात लढलो. आमचे नगरसेवक पाच ते सहा हजार मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. त्यामुळे आता त्याच पक्षांसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे सरदेसाई म्हणाले. जनतेच्या विश्वासाला तडा जाईल, असे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, चार नगरसेवक अद्याप नोंदणीसाठी पुढे न आल्याने पक्षात अस्वस्थता आहे. यावर बोलताना वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट इशारा दिला. मनसेने शिंदे गटाला पाठिंबा देण्याआधी आमच्याशी चर्चा करायला हवी होती, असे सांगत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नॉट रिचेबल नगरसेवकांवरही नाराजी व्यक्त केली. हे नगरसेवक आमच्या चिन्हावर निवडून आले आहेत. आम्ही पुन्हा एकदा बैठक घेऊ. तरीही ते आले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. आमिषांपासून दूर राहण्याचा निर्धार एकूणच, कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेचे गणित जरी रंगत असले, तरी शिवसेना ठाकरे गटाने स्पष्टपणे विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेतली आहे. घोडेबाजार, दबावतंत्र आणि आमिषांपासून दूर राहण्याचा निर्धार पक्षाने केला असून, पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचाही स्पष्ट संकेत देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात केडीएमसीत सत्तेइतकीच विरोधी पक्षाची भूमिका देखील तितकीच आक्रमक दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
पुणे महापालिका निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. कधीकाळी पुणे महापालिकेत 29 नगरसेवकांचा दबदबा असलेल्या मनसेला यंदाच्या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही. या निकालामुळे पक्षात अस्वस्थता पसरली असून, आता आत्मपरीक्षण आणि संघटनात्मक बदलांची प्रक्रिया सुरू होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पुणे हे मनसेसाठी महत्त्वाचं शहर मानलं जातं. मात्र याच शहरात पक्षाचा पूर्ण सफाया झाल्याने, आगामी काळात मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पराभवावर मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी स्पष्ट आणि मोकळी भूमिका मांडली आहे. निवडणुकांमध्ये विजय-पराभव हे अपरिहार्य असतात, असं सांगत त्यांनी यंदाचा निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता, हे मान्य केलं. पुणे महापालिका निवडणुकीत मनसेने पहिल्यांदाच शिवसेनेसोबत युती करत निवडणूक लढवली होती. मात्र ही युती आणि त्यातून उभा राहिलेला प्रचार अपेक्षित परिणाम देऊ शकला नाही. हा पराभव स्वीकारून पक्षांतर्गत सखोल आत्मचिंतन केलं जाईल, असं संभूस यांनी स्पष्ट केलं आहे. निवडणूक प्रचाराच्या रणनीतीबाबत बोलताना हेमंत संभूस यांनी थेट कबुली दिली की, काही ठिकाणी पक्ष कमी पडला. ही निवडणूक म्हणजे धनशक्ती विरुद्ध संघटनशक्ती असा संघर्ष होता, असं सांगत त्यांनी प्रचाराची आखणी अधिक प्रभावी करता आली असती, याची जाणीव व्यक्त केली. मात्र याचा अर्थ जबाबदारी झटकणं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यातील पराभव हा केवळ निकालापुरता मर्यादित न ठेवता, भविष्यासाठी धडा म्हणून घेतला जाईल, असंही त्यांनी नमूद केलं. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका आता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. हेमंत संभूस यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे लवकरच पुण्यात येणार असून, शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सविस्तर बैठक घेणार आहेत. या बैठकीत निवडणुकीचा आढावा, संघटनात्मक त्रुटी आणि पुढील दिशा यावर चर्चा होणार आहे. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पुणे मनसेमध्ये ठोस बदल दिसतील, असा दावा संभूस यांनी केला आहे. या बदलांमध्ये केवळ मार्गदर्शनच नव्हे, तर प्रत्यक्ष संघटनात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. पुणे शहर कार्यकारणी, विभागीय रचना, जबाबदाऱ्यांचे पुनर्वाटप अशा अनेक बाबींवर फेरविचार होऊ शकतो. मनसेच्या स्थापनेपासून पुणे हे पक्षाचं प्रयोगशील केंद्र राहिलं आहे. त्यामुळे या शहरात पुन्हा संघटन उभं करण्यासाठी कठोर पावलं उचलली जातील, असं संकेत मिळत आहेत. नव्या कार्यकर्त्यांना संधी शहराध्यक्षपदाबाबत विचारणा करण्यात आली असता, हेमंत संभूस यांनी अतिशय सूचक उत्तर दिलं. फक्त शहराध्यक्षपदावर लक्ष केंद्रित करू नका, असं सांगत त्यांनी आगामी काळात पक्षात अनेक बदल होतील, असं स्पष्ट केलं. याचा अर्थ केवळ एक पद नाही, तर संपूर्ण शहर कार्यकारणीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. काही जुने चेहरे बाजूला केले जाऊ शकतात, तर नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शून्य जागांचा निकाल मनसेसाठी मोठा धक्का एकूणच पुणे महापालिका निवडणुकीतील शून्य जागांचा निकाल मनसेसाठी मोठा धक्का ठरला आहे. मात्र या धक्क्यानंतर पक्ष पुन्हा उभारी घेण्यासाठी कोणती दिशा घेतो, हे महत्त्वाचं ठरणार आहे. राज ठाकरे पुण्यात येऊन भाकरी फिरवत संघटन मजबूत करतात का, नवे चेहरे पुढे आणतात का, की जुन्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करतात, याकडे आता केवळ मनसे कार्यकर्त्यांचंच नव्हे, तर संपूर्ण राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलं आहे.
कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सतर्क झाल्याचे चित्र समोर आले आहे. करवीर तालुक्यातील वाशी गावात भरारी पथकाने धाड टाकून तब्बल पाच लाख रुपये किमतीच्या साड्या जप्त केल्याची मोठी कारवाई उघडकीस आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, निवडणूक आयोगाच्या पथकांकडून पुढील काळात अशाच धाडी […] The post पाच लाखांच्या साड्या पकडल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ठाकरे गटाचे नगरसेवक कुटुंबासह गायब
कल्याण : प्रतिनिधी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नगरसेवकांची पळवापळवी अजून थांबलेली नाही. त्यातच आता कल्याण-डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे बेपत्ता होण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. महाराष्ट्रात विजयाचा गुलाल सुकण्यापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे निवडून आलेले ४ प्रमुख नगरसेवक गेल्या १६ तारखेपासून अचानक नॉट रिचेबल झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही […] The post ठाकरे गटाचे नगरसेवक कुटुंबासह गायब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांसह चौघांना ‘पद्मश्री’ जाहीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने २०२६ वर्षासाठीच्या प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावर्षी ४५ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. या मानाच्या यादीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांना पुरस्कार मिळाले आहेत. देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानामध्ये समाविष्ट असलेला पद्म पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा ३ श्रेणींमध्ये दिला जातो. कला, समाजसेवा, […] The post महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांसह चौघांना ‘पद्मश्री’ जाहीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा : गुलाबराव पाटील
जळगाव : प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे नेहमी झोकात नको ते वक्तव्य करत असतात. त्यांच्या अशा वक्तव्यांनी ते नेहमी चर्चेत येतात. आता अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून ते चर्चेत आले आहेत. जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, आता राज्याच्या पोटी राजा जन्माला येत […] The post तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा : गुलाबराव पाटील appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एसटीच्या नवीन बसेसवर कंत्राटी चालक
मुंबई : प्रतिनिधी एसटीच्या ताफ्यात लवकरच तब्बल ८००० स्वमालकीच्या नव्या गाड्या दाखल होणार आहेत. त्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. प्रवाशांसाठी ही मोठी आनंदाची बाब असली तरी एसटीच्या नव्या गाड्यांवर चालक-वाहक मात्र कंत्राटी असणार आहेत. त्यामुळे एसटीसमोर हे मोठे आव्हान ठरणार आहे. एसटीच्या गाड्यांचा ताफा वाढत असून येत्या दोन, तीन वर्षांत नवीन बसेसचा आकडा २४ हजारांपलीकडे […] The post एसटीच्या नवीन बसेसवर कंत्राटी चालक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिरवा रंग हा दहशतवादाचा आहे का?: इम्तियाज जलील
ठाणे : प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा इथल्य एआयएमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या वादग्रस्त विधानानंतर एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मुंब्राच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू, असे विधान केले. हिरवा रंग हा दहशतवादाचा आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. भाजपचे मंत्री चंद्रशेखर […] The post हिरवा रंग हा दहशतवादाचा आहे का?: इम्तियाज जलील appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर AIMIM च्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या 'मुंब्रा हरा कर देंगे' विधानाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पाठिंबा दिला. येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू, असे विधान जलील यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात ठिणगी पडली आहे. जलील यांच्या या चॅलेंजला भाजप आमदार आणि राज्याचे मंत्री नीतेश राणे यांनी अत्यंत तिखट आणि जहरी शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. 'महाराष्ट्र हिरवा करू' म्हणणाऱ्या हिरव्या सापाला जमिनीत गाडू, असा इशारा नीतेश राणे यांनी इम्तियाज जलील यांना दिला. मुंब्र्यातील एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी निवडणुकीनंतर एक वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचा बचाव करताना माजी खासदार इम्तियाज जलील यांनी, सहर शेख यांचे विधान हे केवळ त्यांचे वैयक्तिक मत नसून पक्षाचे अधिकृत मत आहे, असे सांगत संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करण्याचा संकल्प बोलून दाखवला होता. जलील यांच्या याच 'हिरव्या' विधानाचा नीतेश राणे यांनी समाचार घेतला आहे. नेमके काय म्हणाले नीतेश राणे? मीडियाशी संवाद साधताना नीतेश राणे यांनी इम्तियाज जलील यांचा उल्लेख 'हिरवा साप' असा करत जोरदार प्रहार केला. हा हिरवा साप कदाचित आपला इतिहास विसरला असावा. औरंगजेब आणि टिपू सुलताननेही महाराष्ट्राला 'हिरवे' करण्याचे स्वप्न पाहिले होते. पण त्यांना याच भूमीत गाडून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी भगवा फडकवत इतिहास घडवला आहे, अशा शब्दांत राणेंनी जलील यांची कानउघाडणी केली. हिंदू राष्ट्राच्या भूमिकेवर राणे ठाम नीतेश राणे यांनी यावेळी हिंदू राष्ट्राचा पुनरुच्चार करत आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले, हे हिंदू राष्ट्र आहे आणि हे कायम भगवेच राहणार, हे जितक्या लवकर हे लोक समजून घेतील तितकं त्यांच्यासाठी चांगलं आहे. जो कोणी या हिंदू राष्ट्राला हरवण्याचे स्वप्न पाहील, त्याला महाराष्ट्रातील हिंदू औरंगजेबाच्या कबरमध्ये पुरल्याशिवाय राहणार नाहीत. राणेंच्या या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून एमआयएम आता यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कमळाचा हिरवा देठ म्हणजे एमआयएम का? दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या ‘महाराष्ट्र हिरवा करण्याच्या’ वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया देत, उपरोधिक सवाल उपस्थित केला. इम्तियाज जलील यांच्याबद्दल आपल्याला आदर असल्याचे सांगून त्यांनी स्क्रिप्टेड गेममध्ये आपल्याला रस नसल्याचे स्पष्ट केले. भाजपच्या झेंड्यात भगवा आणि हिरवा रंग आहे, कमळाच्या देठाचाही रंग हिरवाच आहे, मग हा हिरवा रंग म्हणजे एमआयएम आहे का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजप आणि एमआयएम यांच्यातील राजकीय रंगसंगतीवर अप्रत्यक्ष टीका केली.
कोविडनंतर कौटुंबीक व्यवस्थेत मोठा बदल
नवी दिल्ली : भारतातील शहरी भागात पाळीव प्राण्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगाने बदलत आहे. एकेकाळी घराचे रक्षक मानले जाणारे कुत्रे आणि मांजरी आता कुटुंबातील सदस्य बनले आहेत. श्रीमंत आणि मध्यमवर्गीय भारतीयांमध्ये आपल्या पाळीव प्राण्यांना स्वत:च्या मुलांसारखे जपण्याची ओढ वाढल्याने फर बेबीज ही संकल्पना लोकप्रिय होत आहे. या भावनिक बदलामुळे देशात एक नवी पेट केअर इकॉनॉमी उभी […] The post कोविडनंतर कौटुंबीक व्यवस्थेत मोठा बदल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

31 C