महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना आणखी एक मोठा राजकीय धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. महिलांवरील अत्याचारांचे आरोप, व्हिडिओ क्लिप्स आणि विविध गंभीर गुन्ह्यांच्या चर्चेमुळे हे प्रकरण अधिकच गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर चाकणकर यांचे नाव समोर आले होते, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. या प्रकरणात चाकणकर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या अशोक खरातच्या तथाकथित दरबारात उपस्थित असल्याचे दिसल्याने वाद निर्माण झाला. याशिवाय त्यांच्यात आर्थिक व्यवहार असल्याचेही आरोप झाले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना अशा प्रकारच्या वादात नाव येणे ही गंभीर बाब मानली गेली. अखेरीस वाढत्या दबावामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तो सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र, राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणे दिली असून खरात प्रकरणाचा उल्लेख टाळला. राजीनाम्यानंतरही त्यांच्यावरील दबाव कमी झालेला नाही. सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावर आहेत. मात्र, हे पदही त्यांच्या हातातून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पक्षातील अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये याबाबत एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. चाकणकर यांच्या नावामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नेत्यांमध्ये आहे. बैठकीत अनेक आमदारांची मागणी दरम्यान, दर मंगळवारी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीतही हा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला. देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत अनेक आमदारांनी चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेमुळे पक्षावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे तातडीने निर्णय घेण्याचा दबाव वाढत आहे. निर्णय सुनेत्रा पवार यांच्या हातात आता या सर्व घडामोडींनंतर चाकणकर यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय सुनेत्रा पवार यांच्या हातात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षातील वाढता विरोध आणि जनमताचा दबाव लक्षात घेता, पुढील काही दिवसांत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाकणकर यांना आणखी एक धक्का बसतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज चैत्र शुद्ध नवमी... अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव! मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा आज संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. चैत्र नवरात्रीची सांगता आणि प्रभू रामांच्या आगमनाचा आनंद व्यक्त करण्यासाठी सकाळपासूनच राज्यातील राम मंदिरांमध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. 'जय श्रीराम' आणि 'सियावर रामचंद्र की जय'च्या घोषणांनी अवघा आसमंत दुमदुमून गेला असून, गावागावांत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. राम नवमीनिमित्त आज पुणे शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांमुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत शहरातील बाजीराव रोड आणि लष्कर (कॅम्प) परिसरातील वाहतूक वळवण्यात येणार असून काही रस्ते पूर्णपणे बंद राहतील. असे असतील बदल बाजीराव रोड: पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असेल. वाहनधारकांनी टिळक रोड – अलका टॉकीज – खंडोजी बाबा चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा. लष्कर विभाग: वाय जंक्शन येथील वाहतूक बंद राहील. एम.जी. रोडवरील वाहने १५ ऑगस्ट चौकातून वळवण्यात येतील, तर महंमद रफी चौकातील वाहतूक ईस्ट स्ट्रीटमार्गे जाईल. कोहिनूर हॉटेल परिसरातील वाहतूक भोपळे चौकमार्गे वळवण्यात आली आहे. नागरिकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे. शेगावमध्ये ७५० हून अधिक दिंड्या दाखल शेगावमध्ये आज १३२ वा श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त श्रींच्या मंदिरावर मनमोहक रोषणाई करण्यात आली असून राज्यभरातून ७५० हून अधिक भजनी दिंड्या संतनगरीत दाखल झाल्या आहेत. दुपारी श्रींची पालखी, रथ आणि अश्वासह नगर परिक्रमेसाठी निघणार असून सायंकाळी ६ वाजता मंदिरात परतेल. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता दर्शनासाठी 'एकेरी मार्ग' (One-way) निश्चित करण्यात आला आहे. काळाराम मंदिरात प्रभू रामाला 'सोन्याच्या मिशा पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात रामजन्मोत्सवानिमित्त प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांना 'सोन्याच्या मिशा' लावून अनुपम शौर्य शृंगार करण्यात आला आहे. अरण्यकांडातील १४ हजार राक्षसांच्या वधाचे आणि प्रभूंच्या अजोड पराक्रमाचे प्रतीक म्हणून गुढीपाडवा ते द्वादशीपर्यंत हे विशेष रूप सजवले जाते. पेशवेकालीन या मंदिरात प्रभूंच्या या विलोभनीय दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. बेलापूरचा रामनवमी उत्सव अन् 'बेलापूर श्री' कुस्तीचा थरार बेलापूर गावात २०० वर्षांची परंपरा असलेला रामनवमी उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा होत आहे. 'राम जन्मला'च्या गजराने मंदिर परिसर दुमदुमला असून, रात्री निघणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. हनुमान जन्मोत्सवापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्याची सांगता भव्य जत्रेने होईल, जिथे लाल मातीतील कुस्त्यांच्या जंगी फडात 'बेलापूर श्री' हा मानाचा किताब प्रदान केला जाईल.
धाराशिव जिल्ह्यातील पळसप येथे रविवारी ता. 29 एकदिवसीय ग्रामीण मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून यावेळी चर्चासत्र, कविसंमेलनासह विविध सांस्कृतीक कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजन समितीचे जिल्हाध्यक्ष बंटी मईंग यांनी दिली आहे. शिक्षण महर्षी माजी आमदार वसंतराव काळे यांच्या पुण्यतिथिनिमित्त स्व. अजितदादा पवार साहित्य नगरी, पळसप येथे आयोजित संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार विक्रम काळे तर अध्यक्ष म्हणून नांदेड येथील साहित्यिक डॉ. सुरेश सावंत उपस्थित राहतील. यावेळी सकाळी आठ वाजता ग्रंथदिडीचे उद्घाटन जयकुमार शिताळे यांच्या हस्ते होईल. सकाळी दहा वाजता मराठी साहित्य मंडळाचे डॉ. घ. ना. पांचाळ यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी सव्वा दहा वाजता चित्रकार शिवाजीराव हांडे यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन साहित्यीक राजेंद्र अत्रे यांच्या हस्ते होईल. सकाळी साडेदहा वाजता संमेलनाचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजीमंत्री संजयजी बनसोडे, साहित्यक प्रा.फ.म.शहाजिंदे, संमेनाध्यक्ष मा. डॉ. सुरेश सावंत व संमेलनाचे स्वागताध्यक्ष विक्रम काळे यांच्या उपस्थितीत होईल. दरम्यान, दुपारी दिड वाजता बदलते ग्रामीण जीवन या विषयावर परिसंवाद होणार असून यामध्ये प्रा.गंगाधरराव हिंगोले, प्राचार्य डॉ राजकुमार मस्के व प्राचार्य डॉ. कैलास इंगळे इत्यादी विचारवंत सहभागी होणार आहेत. दुपारी तीन ते चार यावेळेत सत्यशिला तौर, डॉ.सुरेश पाटील व स्वाती कान्हेगांवकर यांच्या उपस्थितीत कथाकथन होईल. दुपारी साडेचार वाजताल जिजा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कवी शिवाजी कऱ्हाळे, गोडाती काळे, सिंधुताई दहिफळे इत्यादींचा सहभाग असणार आहे. संध्याकाळी सहा वाजता आमदार सतीश चव्हाण, प्रविण स्वामी यांच्या हस्ते संमेलनाचा समारोप होणार आहे.यावेळी साहित्यिकाचा सत्कार होणार आहे. रात्री आठ वाजता वसंतोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम होईल. या संमेलनात जिल्ह्यातील रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बंटी मईंग, आनंद जाधव, आत्माराम मईंग, मनोहर पोपळाईत, सुभाष जिरवणकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सर्वपक्षीय बैठकीला जर पंतप्रधान नरेंद्र मोदी जर उपस्थित नसतील तर त्या बैठकीला काही अर्थ नाही, पंतप्रधान बैठकीला येणार नव्हते तर आम्ही सर्वांनी त्या बैठकीला जाणे टाळायला हवे होते, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर भाजपमुळे हिंदुत्वाचे अध:पतन झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री किंवा पोलिस खाते यांना आता शांतपणे काम करू द्या. रोजच या विषयावर चर्चा करत इतर महत्त्वाच्या विषयाकडे पाणी टाकण्याचे काम करू नये. खरात प्रकरणी तपास सुरू असताना त्यावर संशय व्यक्त करणे योग्य नाही. भाजपमुळे हिंदुत्वाचे अध:पतन संजय राऊत म्हणाले की, भाजप सत्तेत आल्यापासून राजकीय नेतृत्व, अध्यात्म आणि हिंदुत्वाचे अध:पतन झाले आहे. राज्यात जे सध्या सुरू आहे त्यावर कोणावर आणि कितीवेळा बोलणार, मुख्यमंत्री, ज्यांची नावे यामध्ये येत आहेत त्यांनी या विषयावर बोलणं गरजेचे आहे. आमच्या पक्षात काहीही मतभेद नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. मी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा स्थापनेपासूनचा सदस्य आहे. माझ्या जन्मापासून मी या पक्षाचा सदस्य आहे. माझी नियुक्ती बाळासाहेबांनी केली संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना नेते म्हणून नियुक्त केले त्यामधील मी एक आहे. उद्धव ठाकरे आणि माझे काय नाते आहे हे सर्वांना माहिती आहे. उद्धव् ठाकरेंनी बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीला मी हजा नव्हतो. पण त्या बैठकीत कोणी नाराजी व्यक्त केली नाही. नाराजीच्या बातम्यावर जर आम्ही काम करायला लागलो तर पक्ष वाढलाच नसता. उद्धव् ठाकरेंनी बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीत कोणी नाराजी व्यक्त केली नाही. ठाकरे गटाच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा! शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राज्यसभेच्या जागेवरून खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पक्षप्रमुखांसमोरच तीव्र नाराजी व्यक्त केल्याने बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 'आय वॉन्ट टू प्रोटेस्ट' (I want to protest) म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची चर्चा आहे.
जनाब संजय राऊत यांचा जन्म शिवसेना वाढवण्यासाठी झाला की शिवसेना संपवण्यासाठी झाला हे महाराष्ट्राने पाहिले आहे. उबाठा गटाकडून संपवण्याची सुपारी तुम्ही काँग्रेसकडून घेतली आहे, म्हणून रोज वायफळ बडबड करत उबाठाचे अस्तित्व संपवण्याचे काम संजय राऊत करत आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, राऊतांनी सांगू नये की माझा जन्म शिवसेनेत झाला, मी जन्मापासून शिवसेनेत आहे हे ऐकून लोकांना हसू येते.कारण तुम्ही शिवसेनेविरोधात लिहलेले लेख जनतेने वाचले आहेत. उबाठाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचे काम तुम्ही करत आहात. येणाऱ्या काळात तुम्ही संपूर्ण उबाठा गट संपवल्याशिवाय राहणार नाही. उबाठामध्ये दोन गट नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटामध्ये संजय राऊत विरुद्ध उद्धव ठाकरे हा सामना जोरात रंगतो आहे. कारण राज्यसभेच्या निवडणुकीत राऊतांनी ज्या पद्धतीने शरद पवारांचे नाव पुढे करत प्रियंका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्याचे काम राऊतांनी केले. त्यामुळे त्यांच्या दिल्लीतील पुस्तक प्रकाशनाला उद्धव ठाकरे गेले नाही.उबाठा गटामध्ये दुफळी माजली आहे. एका बाजूला राऊतांचा गट तर दुसरीकडे ठाकरेंचा गट असल्याचे दिसून येत आहे. राऊत थोड्या दिवसात उबाठा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. कारण उद्धव ठाकरे त्यांना पुन्हा राज्यसभेची संधी देणार नाही हे त्यांना लक्षात आले आहे. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जातील. राऊत सोनिया गांधींच्या चरणी लीन नवनाथ बन म्हणाले की, भाजपमुळे हिंदुत्त्वाचे अध:पतन झाले आहे असा दावा संजय राऊत करत आहेत. ज्यांनी हिंदुत्वांशी फारकत घेत औरंगजेब फॅन क्लब चालवत आहेत त्यांनी भाजपवर टीका करू नये. तुमचे हिंदुत्व काय आहे हे जनतेने पाहिले आहे. तुमच्या हिंदुत्वामुळे तुम्ही काँग्रेसच्या मांडीला-मांडी लावून पुढे बसलात. औरंगजेब फन क्लब आणि अफजल खानाची वंशावळ पुढे जाण्याचे काम तुमच्या बेगडी हिंदुत्वाकडून सुरू आहे. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून सोनिया गांधींच्या चरणी लीन झालात. त्यामुळे जनतेने तुम्हाला नाकारले आहे. तुम्ही हिंदुत्वावर काही बोलू नका तुम्हाला काहीच अधिकार नाही.
नाशिकच्या 'भोंदूबाबा' अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणावर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अत्यंत प्रखर शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. अशोक खरातला मारून टाकून मोकळे व्हावे, या प्रकरणावर चर्चासुद्धा करू नये, अशा कडक शब्दांत भिडे गुरुजींनी प्रतिक्रिया दिली आहे. खरातच्या कृत्यांचे एकामागून एक प्रकरण समोर येत असतानाच भिडे गुरुजींच्या विधानाने आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. अशोक खरात याने अध्यात्माच्या नावाखाली अनेक पिडीत महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केवळ शोषणच नव्हे, तर अनेकांना धमकावून त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता हडप केल्याचे गंभीर आरोपही त्याच्यावर आहेत. भीती आणि अंधश्रद्धेचा वापर करून खरातने फसवणुकीचे मोठे साम्राज्य उभे केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट होत आहे. अनेक बडे नेते खरातच्या भेटीसाठी जात असत, तर काही नेत्यांच्या घरी त्याचे येणे-जाणे होते. या संदर्भातील काही फोटो आणि पुरावे समोर आल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. राजकीय वरदहस्तामुळेच खरात इतका मोकाट वागत होता का? असा सवाल आता विरोधकांकडून विचारला जात आहे. चर्चा नको, थेट संपवून टाका! या प्रकरणावर भाष्य करताना संभाजी भिडे गुरुजी यांनी अशा प्रवृत्तींना समाजात स्थान असता कामा नये, अशी भूमिका घेतली. अशा गुन्हेगारांवर वेळ घालवून चर्चा करण्यापेक्षा त्यांना कायमस्वरूपी संपवून टाकणे हाच एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान अशोक खरातच्या विरोधात आता समाजमन आक्रमक झाले असून, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी एल्गार पुकारला आहे. दहावीत नापास, गावात 'कोंबडी चोर' अन् नेव्हीत हमाल अशोक खरात याने आपल्या 'अंकशास्त्रा'च्या जोरावर अनेकांना भुरळ घातली होती. मात्र, प्रत्यक्षात तो दहावीच्या परीक्षेत गणित विषयात नापास झाला होता. वावी येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकत असताना त्याचे वर्तन अत्यंत वादग्रस्त होते. घरून अंडी चोरून ती शाळेत विकणे, यासारख्या उद्योगांमुळे त्याला परिसरात 'कोंबडी चोर' किंवा 'मोटर चोर' म्हणून हिणवले जायचे. खरातने केवळ ज्योतिषशास्त्रातच नव्हे, तर आपल्या पेशाबाबतही खोटे दावे केले होते. मर्चंट नेव्हीमध्ये तो 'हमाल' किंवा खालच्या श्रेणीतील कामगार म्हणून रुजू झाला होता. पाच-सात वर्षांनंतर गावात परतल्यावर त्याने स्वतःला 'कॅप्टन' म्हणवून घेण्यास सुरुवात केली.
तालुक्यातील पोरज येथील ११ शेतकऱ्यांना बायर कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या मका बियाण्यांमुळे लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. या शेतकऱ्यांना कंपनीकडून एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई मिळवून दिल्याबद्दल २२ मार्च रोजी मेहकर येथे जाऊन शेतकऱ्यांनी नामदार प्रतापराव जाधव यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. पोरज येथील शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींकडून मका बियाण्यांची खरेदी करून पेरणी केली होती. खरेदी वेळी एकरी ४० क्विंटल उत्पादन मिळेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात अत्यल्प उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे संबंधित प्रति निधीकडून निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरवण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी २ फेब्रुवारी २०२६ पासून खामगाव येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला तालुका शिवसेना प्रमुख राजेंद्र बघे, अॅड. अमोल अंधारे, राजेंद्र अमलकार यांनी भेट देऊन शेतकऱ्यांची बाजू जाणून घेतली. तसेच याबाबत ना. प्रतापराव जाधव यांच्याशी संपर्क साधला. यानंतर प्रतापराव जाधव यांनी कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या सूचना केल्या. ४ फेब्रुवारी रोजी कंपनीचे प्रतिनिधी परम सिंग व तालुका कृषी अधिकारी पवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. या वेळी कंपनीकडून एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. त्यानुसार ५ मार्च २०२६ रोजी संबंधित ११ शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली. या प्रसंगी संदीप हेरोडे, देवेंद्र इंगळे, विजय बोराडे, प्रदीप हेरोडे, निलेश वाकोडे, कडूबा शेगोकार, श्याम सकळकडे, अभय बोराडे, चत्तरसिंग बोराडे, शरद बोराडे, संजय काळे यांच्यासह पोरज येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यावसायिक शेती पद्धतीचा अवलंब देशांतर्गत शेती व्यवसायाला शाश्वतेकडे नेणारा ठरणार, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. भाजीपालाशास्त्र विभाग, उद्यानविद्या शाखा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे एकात्मिक उद्यान पिके विकास अभियानांतर्गत सुपारी व मसाला पिके संचालनालय कालिकत, केरळ यांच्या अर्थसहाय्यातून ‘मसाला व सुगंधी वनस्पती पिकांचे शाश्वत उत्पादन व प्रक्रियेसाठी अद्ययावत तंत्रज्ञान’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय शेतकरी चर्चासत्र उद्घाटनप्रसंगी डॉ. गडाख बोलत होते. विदर्भ व मराठवाड्याचा विचार करता अपारंपरिक पिकांचा प्रभावी वापर आवश्यक आहे, असे सांगून विद्यापीठाद्वारे मसाला व सुगंधी वनस्पती पिकांचे क्षेत्र वाढीसाठी राबवलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली. आपल्याकडील जमिनीच्या २० टक्के क्षेत्रावर नगदी अथवा अपारंपरिक पिकांची लागवड करत उत्पादनावर आधारित भविष्यातील पीक पद्धतीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. मिरची व भाजीपाला संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. श्याम घावडे, विसार शिक्षण विभागप्रमुख डॉ. नितीन कोष्टी, भाजीपालाशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विजय काळे, डॉ. अभय वाघ, कृषी विज्ञान केंद्र अकोलाचे डॉ. गजानन तुपकर, कृषीविज्ञान केंद्र वाशीमचे डॉ. निवृत्ती पाटील, कृषी विभागाचे विजय शेगोकार, राज्यभरातून आलेले शेतकरी बंधू व भगिनींची सभागृहात उपस्थिती होती. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तथा दीप प्रज्वलनाने सुरुवात झालेल्या चर्चासत्रात मसाला व सुगंधी वनस्पती पिकांबाबत अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान, पीक संरक्षण, मसाला व सुगंधी वनस्पती पिकांचे मूल्यसंवर्धन तथा प्रक्रिया, विपणन व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. विद्यापीठ प्रक्षेत्र भेटीतून प्रत्यक्ष लागवड तंत्रज्ञान शेतकरी बांधवांना आत्मसात करता येणार आहे. प्रास्ताविक अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. अरविंद सोनकांबळे यांनी केले तर अधिष्ठाता कृषी डॉ. देवानंद पंचभाई यांनी स्वागतपर भाषण केले. सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले तर डॉ. विजय काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. चर्चासत्र आयोजनासाठी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात उद्यानविद्या विभागाचे अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. उपक्रमास राज्यभरातून बहुसंख्य शेतकऱ्यांची उपस्थित होते. मसाला पिकांचे प्रदर्शन सुद्धा भरवण्यात आले. प्रदर्शनात सहभागी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कृषी विद्यापीठ अथवा तत्सम संस्थांच्या प्रक्षेत्र भेटीने प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहता येते. विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी राज्यांतर्गत शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या अथक प्रयत्नातून व काळसुसंगत शास्त्रीय मार्गदर्शनात राज्यातील मसाला पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. हळद, आले, धने, ओवा, मेथी, मिरची आदी मसाला पिके व सुगंधी वनस्पतींचे उत्पादन घेण्याकडे कल वाढत आहे. विद्यापीठाच्या उद्यानविद्या शाखेने वैदर्भीय शेतीला नवीन दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केल्याचा उल्लेख केला. शेतकऱ्यांना अपारंपरिक पिकांच्या अद्ययावत लागवड तंत्रज्ञानाबद्द्ल माहिती व प्रक्रिया तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी भाजीपालाशास्त्र विभाग, उद्यानविद्या शाखा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे मसाला व सुगंधी वनस्पती पिकांचे शाश्वत उत्पादन व प्रक्रियेसाठी अद्ययावत तंत्रज्ञान विषयावर २४ व २५ मार्चला दोन दिवसीय राज्यस्तरीय शेतकरी चर्चासत्र कृषी महाविद्यालयाच्या समिती सभागृहात घेण्यात आले. उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी डॉ. देवानंद पंचभाई, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. अरविंद सोनकांबळे, फळशास्त्रविभाग प्रमुख डॉ. शशांक भराड यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी, राज्य शासन पुरस्कृत महिला उद्योजक शेतकरी शोभा गायधणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
औषध खरेदीसाठी दरवर्षी शासनाकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करुन दिला जातो तरीही येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचालित सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी आवश्यक ती आैषधी बाहेरून आणण्यासाठी चिठ्ठी लिहून दिली जात आहे. यातून ‘जीएमसी’च्या आवारातील खासगी मेडिकल चालकाचा खिसा भरला जात आहे, हे चित्र ‘दिव्य मराठी’ने बुधवारी रुग्णालय परिसरात दुपारी साडेबारा ते दीड वाजेच्या दरम्यान केलेल्या पाहणीत दिसून आले. आ. अमोल मिटकरी यांनी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील औषधांच्या तुटवड्याबाबत १३ मार्च २०२६ ला विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा कोणताही तुटवडा नाही, असा दावा त्यांनी केला होता. अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयाबाबत आलेल्या तक्रारींची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून अहवाल मागवला जाईल. तसेच ‘शासकीय रुग्णालयांत औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. रुग्णांना बाहेरून औषधे लिहून देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. मात्र, त्यांच्या आदेशाला डावलून येथील‘सर्वोपचार’ रुग्णालयात बाहेरील औषधांसाठी चिठ्ठी लिहून देणे सुरूच असून, यामुळे गोरगरीब रुग्णांच्या खिशाला नाहक झळ बसत आहे. उर्वरित पान ४ डॉक्टरांकडून रुग्णांना औषधांची चिठ्ठी देऊन बाहेरील मेडिकलमधून औषधी आणण्यास सांगितले जाते. रुग्णालयाच्या आवारातील एका खासगी मेडिकल दुकानांकडे रुग्णांना पाठवले जात असल्याच्या तक्रारीही आहेत. रुग्णालयाच्या आवारातील या मेडिकलवर औषध खरेदीचा रुग्णांना आग्रह केला जातो. रुग्ण दुसरीकडे गेला तर बऱ्याचदा ती आैषधी उपलब्ध होत नाही, अशी स्थिती आहे. संबंधित डॉक्टरांना आता ‘जीएमसी’ प्रशासन काय तंबी देते, याकडे लक्ष लागून आहे. ...तर इथे करा तक्रार रुग्णांना बाहेरून औषधी केसपेपरवर किंवा साध्या कागदाच्या चिठ्ठीवर लिहून दिल्यास रुग्णांनी तत्काळ संबंधित रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी. याशिवाय शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य विभाग किंवा शासनाच्या हेल्पलाइनवर संपर्क करावा. लेखी तक्रार केल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता अधिक असते.मात्र बहुतांश रुग्ण लेखी तक्रार करण्यास धजावत नाही, त्यामुळे डॉक्टरांचे फावते आहे. सर्व औषधांचा पुरेसा साठा ^अँटीबायोटिक्स, जीवनरक्षक औषधे, लस साठा पुरेसा आहे. रुग्णांना बाहेरून आैषधी लिहून देणे बंद केले आहे. आपल्याकडे उपलब्ध आैषधीची दैनंदिन यादी सर्व डॉक्टरांना दिली जाते. तरी काही डॉक्टर बाहेरची आैषधी लिहत असतील तर त्यांना ते बंद करण्याच्या सूचना तातडीने दिल्या जातील.- डॉ. संजय सोनुने, अधिष्ठाता, जीएमसी. विशिष्ट मेडिकलमधूनच औषधी खरेदीचा आग्रह का? रुग्णांच्या नातेवाइकांचा सवाल
रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर पाचशेच्या नोटांचा नियंत्रित पुरवठा होत असल्यामुळे शहरातील एसबीआयच्या एटीएममध्ये मंगळवारी सायंकाळपासून तुटवडा दिसून आला. बुधवारी सकाळी एसबीआयच्या मलकापूर, आदर्श कॉलनी आणि तुकाराम चौकातील एटीएममध्ये पाहणी केली. मलकापूर एसबीआयचे एटीएम बंद होते. आरबीआयकडून पाचशेच्या नोटांचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे कमतरता जाणवत आहे. एटीएममध्ये पाचशेच्या नोटांचे तीन तर शंभरच्या नोटांचा एक स्लॉट असतो. त्यामुळे एकाच स्लॉटमध्ये शंभरच्या नोटा टाकता येतात व लवकर संपून जातात, पाचशेच्या नोटाच नसल्यामुळे आम्ही एटीएम बंद ठेवल्याचे तेथील शाखाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाऊन रक्कम काढता येत आहे. आदर्श कॉलनीतील एसबीआय एटीएममधून दोन हजार रुपयांची रुपयांची रोकड काढली असता एक ५०० रुपयांची आणि १५ शंभर रुपयांच्या नोटा निघाल्या. तर तुकाराम चौकातील एसबीआयच्या एटीएममधून १०० रुपयांच्या नोटा निघत होत्या. दरम्यान, शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियात याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या बँकेला संलग्न ७ एटीएममध्ये कॅश सुरळीत असल्याचे सांगितले. शाखेला एटीएम अटॅच असल्यामुळे त्यांना अडचण आली नाही, असे सेंट्रल बँकेच्या प्रमुख शाखेचे व्यवस्थापक सचिन डोके यांनी सांगितले. दरम्यान, एसबीआयच्या शहरात भरपूर शाखा असून एटीएमची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, एटीएममधून १०० रुपयांच्या चलनात कमी रक्कम निघत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना बँकेच्या शाखेत जाऊन रक्कम काढावी लागत आहे. {ग्राहकांना एटीएममधून मर्यादित रक्कम काढता येत असल्याचे दिसून आले. अधिक रक्कम काढायची असल्यास संबंधित बँक शाखेत जाऊन ग्राहकांना रक्कम काढता येत होती. अनेक ग्राहकांनी एसबीआयच्या शाखेत जाऊन विड्रॉल स्लिप भरत रक्कम काढल्याचे सांगितले. {ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाऊन वेळ खर्ची घालावा लागत आहे. बँकांच्या शाखेत जाऊन पैसे काढण्याचा ग्राहकांना सराव राहिलेला नाही. एटीएममधून पैसे काढून व्यवहार करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. अधिक रकमेसाठी आता बँकेच्या शाखेचाच पर्याय आरबीआयकडून पाचशेच्या नोटांचा पुरवठा कमी ^रिझर्व्ह बँकेने पाचशेच्या नोटांचा पुरवठा कमी केला आहे. पाचशेच्या नोटांचा तुटवडा जाणवत असून पुरवठा करण्याबाबत आरबीआयला तीनदा मेल केला आहे. आरबीआयने एटीएममध्ये वापरण्याजोग्या जुन्या नोटा एटीएममध्ये टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचे काम चालू आहे. नोटांचा पुरवठा ५ एप्रिल नंतर सुरळीत होण्याची शक्यता आहे. - स्वप्निल लग्गड, सहाय्यक व्यवस्थापक, एसबीआय मुख्य शाखा, टॉवर चौक.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून, सहकार गटातील ज्येष्ठ सदस्य व बाजार समितीचे संचालक विजय उर्फ राजाभाऊ कळमकर यांची उपसभापतीपदी निवड झाली. या निवडीमुळे तालुक्यातील सहकार गटाने राजकारणात समतोल साधत विरोधकांना आश्चर्याचा धक्का दिला. पूर्वनियोजनानुसार अडीच-अडीच वर्षांचा कार्यकाळ विभागून उपसभापतीपदासाठी सहकार पॅनलकडून नाव सर्वानुमते आधीच निश्चित केले होते. त्यामुळे २४ रोजी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात झा लेली निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पूर्ण झाली. प्राधिकृत अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १८ सदस्यांपैकी १७ सत्ताधारी व १ विरोधी सदस्य उपस्थित होते. उपसभापतीपदासाठी विजय कळमकर यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली . या प्रक्रियेत सहकार नेते अनंत साबळे, सभापती अॅड. जयंत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालकांशी चर्चा करून एकमताने निर्णय घेतला. निवडीनंतर नवनियुक्त उपसभापतींचा सत्कार करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ संचालक शंकर चोरे व इतर सदस्यांनी बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतकरी हिताच्या निर्णयांसाठी अधिक वेळ देण्याचे आवाहन केले. संपूर्ण संचालक मंडळाने यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नवनियुक्त उपसभापती विजय कळमकर यांनी दोन वेळा सेवा सहकारी संस्था गटातून संचालक म्हणून निवडून आल्यानंतर उपसभापतीपदाचा मान मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला सहकार क्षेत्रातील मान्यवर, संस्थांचे संचालक, प्रतिनिधी उपस्थित होते..
शिवटेकडी हे अमरावतीकरांसाठी केवळ एक पर्यटन स्थळ नसून, ते ऐतिहासिक व सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक मानले जाते. येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा नागरिकांमध्ये प्रेरणा जागवतो. याच परिसरात साकारत असलेली ‘शिवसृष्टी’ ही संकल्पना शहराच्या सांस्कृतिक वारशाला अधोरेखित करणारी ठरणार असून, या प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाच्या नियोजन, अंमलबजावणी आणि गुणवत्तेवर विशेष भर देण्याची गरज सभेत अधोरेखित करण्यात आली. महानगरपालिकेच्या शिवटेकडी (मालटेकडी) व्यवस्थापन समितीची विस्तृत आणि महत्त्वपूर्ण सभा महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या अध्यक्षतेखाली वातावरणात पार पडली. शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेली शिवटेकडी ही निसर्ग संपन्न आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्यामुळे त्याच्या सर्वांगीण विकासासाठी या बैठकीत सखोल चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याशिवाय, येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि शिवप्रेमींसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, माहिती केंद्र, पार्किंग व्यवस्था, तसेच मार्गदर्शक फलक यांसारख्या मूलभूत सुविधांची उभारणी करण्याचे नियोजन करण्यात आले. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि ऐतिहासिक माहिती देणाऱ्या डिजिटल माध्यमांचा वापर करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. कामांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद, कामांचे दर करार आणि टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करण्याचे नियोजन यावरही सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. विकासकामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाने काटेकोर धोरण आखण्याचा निर्णय घेतला. सभेत उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी शिवटेकडीचा विकास हा केवळ भौतिक सुविधांपुरता मर्यादित न ठेवता, तो सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या आदर्श प्रकल्प म्हणून विकसित करण्याचा निर्धार व्यक्त केला. येत्या काळात शिवटेकडी हे अमरावती शहराचे प्रमुख आकर्षण केंद्र ठरेल आणि शहराच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे स्थान मिळवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शिवटेकडीच्या विकासामुळे नागरिकांना दर्जेदार विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होणार असून, पर्यटकांची संख्या वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प शहराच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बैठकीस आयुक्त सौम्या शर्मा , स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, पक्षनेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, शिवटेकडी व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक दिनेश बुब, नगरसेवक प्रदीप हिवसे, नगरसेविका राधा कुरील, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, उद्यान अधीक्षक अजय विंचूरकर, राजु कुरील, निरीक्षक मुकेश खारकर, महेश जोशी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत शिवटेकडी परिसराच्या सौंदर्यीकरणात अधिक भर घालण्याबाबत विविध प्रस्ताव मांडण्यात आले. यामध्ये आकर्षक लँडस्केपिंग, हरित क्षेत्राचा विस्तार, पादचारी मार्गांची सुधारणा, विश्रांतीसाठी बाकांची व्यवस्था, प्रकाशयोजना अधिक सक्षम करणे, तसेच स्वच्छतेची नियमित देखभाल यांसारख्या बाबींवर चर्चा झाली. नागरिकांना सुरक्षित आणि सुखद अनुभव मिळावा यासाठी सुरक्षा व्यवस्थेतही सुधारणा करण्यावर भर देण्यात आला. शिवटेकडी परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेवरही दिला जाणार भर
शहराच्या वडाळी, मंगलधाम कॉलनी, एसआरपीएफ कॅम्प, जुना बायपास या भागात बिबट्याने संचार केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे तत्काळ उपाययोजना करा, अशी मागणी आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी आज, बुधवारी विधीमंडळात रेटून धरली. अमरावती शहरालगत वडाळी वनपरिक्षेत्र व पोहरा जंगल असून या भागात बिबट्याच्या अधिवास आहे. सीसीटीव्ही कॅमेरामध्येही तसे दृश्य कैद झाले आहे. दरम्यान अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबट्याची शहराकडे भटकंती सुरु असून त्यामुळे तेथील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. या भागातील काही पाळीव जनावरेही बिबट्याने फस्त केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परिणामी मंगलधाम परिसरातील नागरिक सायंकाळी ६ नंतर घराबाहेर पडत नसून या भागात ऑटो-रिक्षादेखील मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यासाठी कोणती कार्यवाही व उपाययोजना करण्यात आल्या ? वनविभागाला तसे दिशा-निर्देश देण्यात आले का ? असा प्रश्नही आमदार सुलभाताई खोडके यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा प्रशासन व स्थानिक पोलीस यंत्रणेला सोबत घेऊन तत्परतेने प्रभावी उपाययोजना करण्यासंदर्भात वन विभागाला निर्देश देणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबट्याची शहराकडे भटकंती सुरु असून त्यामुळे तेथील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. या भागातील काही पाळीव जनावरेही बिबट्याने फस्त केल्याच्या घटना आल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी व्हिएमव्ही भागात धुमाकूळ दोन वर्षांपूर्वी एका बिबट्याने चक्क व्हीएमव्ही परिसर व पुंडलिकबाबा नगर , पाठपुस्तक मंडळापर्यंत शिरकाव करून धुमाकूळ घातला होता. याबाबतसुद्धा आमदार सुलभाताई खोडके यांनी सभागृहाला अवगत करून वनमंत्री गणेश नाईक यांचे लक्ष वेधले होते. पुढे त्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते.
जर या देशाची लोकशाही सक्षम करायची असेल, तर ग्रामसभा सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत गावातील प्रत्येक नागरिकाला ग्रामसभेचे महत्त्व उमजत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ग्रामीण विकास साधला जाणार नाही, असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. हर्षवर्धन देशमुख यांनी केले. ‘संत गाडगेबाबांची दशसूत्रे आणि ग्रामविकास’ या विषयावर आयोजित सरपंच कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरूजी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विद्या शर्मा, जेष्ठ साहित्यिक डॉ. सतीश तराळ, महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना संस्थापक अध्यक्ष गजानन बोंडे, महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना अध्यक्ष राजेंद्र कराळे व संत गाडगे बाबा अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे उपस्थित होते. हर्षवर्धन देशमुख पुढे म्हणाले, अधिकारांसोबत सरपंच व नागरिकांनी जबाबदारीची जाणीवसुद्धा ठेवली पाहीजे, त्यामुळे सरपंचांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. ग्रामपंचायतीमध्ये होणारे सर्व व्यवहार आणि खर्च गावातील प्रत्येक नागरिकाला समजले पाहिजेत. प्राचार्य डॉ. सतिश तराळ म्हणाले, संत गाडगे बाबांनी समाजाला दिलेली दशसूत्री केवळ आध्यात्मिक उपदेश नसून तो ग्रामविकासाचा एक परिपूर्ण कृती आराखडा आहे. विज्ञानाची जोड देऊन या दशसूत्रीची अंमलबजावणी केल्यास गावे खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होतील. दशसूत्रीतील प्रत्येक सूत्राचा आधुनिक ग्रामविकासाशी संबंध आहे. शिक्षण नसेल तर प्रगती खुंटते. बाबांनी रंजल्या-गांजल्यांसाठी शाळा आणि वसतिगृहे उभारली, कारण त्यांना माहित होते की, विचारांचे परिवर्तन शिक्षणाशिवाय शक्य नाही. केवळ परिसर स्वच्छ ठेवणे म्हणजे स्वच्छता नव्हे, तर विचारांची स्वच्छता राखणे हे ग्रामविकासाचे पहिले पाऊल आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला खिळखिळी करणाऱ्या व्यसनाधिनतेवर प्रहार करताना, सरपंचांनी आपल्या गावातून व्यसनमुक्तीची चळवळ सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात आचार्य वेरूळकर म्हणाले, संत गाडगे बाबांनी दिलेली दशसूत्री हा केवळ उपदेश नसून तो गाव सुखी आणि समृद्ध करण्याचा एक कृती आराखडा आहे. जोपर्यंत गावातील शेवटच्या माणसापर्यंत या दशसूत्रीचा लाभ पोहोचत नाही, तोपर्यंत ग्रामविकास अपूर्ण आहे. गाडगे बाबांनी हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा मंत्र दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महारांनी ग्रामगीतेतून ग्रामविकासाठी संकल्पना मांडली. आजच्या सरपंचांनी आणि युवकांनी केवळ सरकारी अनुदानावर अवलंबून न राहता श्रमदानातून गावे स्वच्छ आणि सुंदर करावीत. संचालन डॉ. राजेश मिरगे यांनी केले. कार्यशाळेला विदर्भातील सरपंच तसेच विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात ग्रामपंचायतीमध्ये नियुक्त झालेल्या प्रशासकाची जबाबदारी व भूमिका यावर लिनाताई तुरकर यांनी, तर शासकीय योजना राबवितांना येणाऱ्या अडचणी यावर प्रा. राजेंद्र कराळे यांनी माहिती दिली. मेहता कमिटी ते घटनादुरुस्ती ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शक असला पाहीजे. फाळणी आणि निर्वासितांच्या प्रश्नांमुळे सुरुवातीच्या काळात ग्रामीण विकासाकडे पूर्णतः लक्ष देता आले नाही. १९५७ मध्ये बळवंतराय मेहता समितीच्या शिफारसींनंतर आणि पुढे १९९३ च्या ७३ व्या घटनादुरुस्तीनंतर देशात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था खऱ्या अर्थाने लागू झाली. गाडगे बाबांच्या दशसूत्रीनुसार ग्रामविकास करणे ही प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी आहे. आदी कायदेशीर बाबीसुद्धा दिवसभराच्या कार्यशाळेत मांडण्यात आल्या.
मध्य प्रदेश सीमेलगत सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या शेंदुर्जनघाट येथे माँ बालासुंदरी देवीचे प्राचीन जागृत मंदिर असून, त्याचा अनेक वर्षांचा इतिहास आहे. हे देवस्थान शेंदुर्जनाघाट येथील बालापेठ या परिसरात आहे. माँ बालासुंदरीच्या नावामुळेच या परिसराला बालापेठ हे नाव पडलेले असावे, असे ज्येष्ठ नागरिक म्हणतात. या परंपरेनुसार येथे चैत्र नवरात्रोत्सव हा अष्टमी ते श्री हनुमान जयंतीपर्यंत आयोजित केला जातो. माता वैष्णव देवीच्या बालरूपात माता येथे विराजमान असल्यानेच माँ बालासुंदरी हे नाव पडलेले असावे, असेही सांगितले जाते. हे मंदिर अत्यंत जागृत असून, बऱ्याच भक्तांचे संकटे दूर करून मातेने आपला आशीर्वाद दिल्याचे भाविकांकडून सांगितले जाते.या मंदिरामध्ये बालासुंदरी मातेच्या दर्शनासाठी बाराही महिने भक्तांगणांची गर्दी दिसून येते. तसेच या देवस्थानात चैत्र नवरात्र व शारदीय नवरात्र असे दोन नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्या अनुषंगाने या वर्षी सुद्धा बुधवार २५ मार्चपासून मातेच्या दरबारामध्ये पंचवार्षिक चैत्र नवरात्र देवीभागवत संगीतमय कथा सुरू झाली आहे. त्याकरिता कथा प्रवक्त्या ह.भ.प.पूर्णा कुलकर्णी अहिल्यानगर यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीतमय देवी भागवताचे आयोजन केले आहे. सोबतच २७ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान,२८ मार्चला शेतकऱ्यांसाठी हवामान मार्गदर्शन, ३० मार्च रोजी देवीचा गोंधळ असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. १ एप्रिल रोजी शोभायात्रा व २ एप्रिलला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दुपारी ११ वाजता काल्याचे कीर्तनाने सांगता होईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजतापासून महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल या दिवशी मंदिर परिसरात मोठ्या यात्रेचे स्वरूप बघितले जाते. परिसरातील सर्व देवी भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे. माँ बालासुंदरी मातेच्या इतिहासाबाबत माहिती घेतली असता माँ बालासुंदरी मातेचे हे देशातील सहावे शक्तिपीठ शेंदूरजनाघाट हे आहे. पहिले शक्तिपीठ देवबन जिल्हा सहारपूर, दुसरे त्रिलोकपूर जिल्हा सिरमोर, तिसरे मुल्ला तालुका बरारा जिल्हा अंबाला हरियाणा, चौथे पवडी तालुका दळवा उत्तराखंड, पाचवे परोले तालुका बिलवा जिल्हा कठुवा जम्मू, तसेच सहावे शक्तिपीठ शेंदुर्जनाघाट जिल्हा अमरावती येथे असल्याची माहिती देवीच्या संस्थानाद्वारे देण्यात आली. या देवीचे दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात, अशी धारणा असल्याने परिसरातील भाविक मोठया संख्येत मंदिरात दर्शनासाठी येतात.
पंधरा दिवस उलटूनही घरगुती गॅस सिलिंडर रिफील करुन मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी २५ मार्चला रिकाम्या सिलिंडरसह जिल्हाकचेरीवर धडक दिली. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी काही नागरिकांना सिलिंडर डिलीव्हर झाल्याचा संदेश प्राप्त झाला आहे. साठा मुबलक आहे म्हणता, मग सिलिंडर रिफील का होत नाही, असा सवाल या नागरिकांनी विचारला. रुक्मिणीनगर भागातील लक्ष्मी गॅस एजंसीशी संबंधित हे ग्राहक आहेत. तुटवड्यामुळे नागरिकांची होत असलेली गर्दी लक्षात घेता या गॅस एजंसीचे शटर गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. दुसरीकडे ज्या ग्राहकांनी १० मार्चला रिफिलींगसाठी नंबर लावला, त्यांना अद्यापही सिलिंडर मिळाले नाही. याऊलट काही जणांच्या मोबाइलमध्ये सिलिंडर डिलीव्हर झाल्याचा संदेश आला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या ग्राहकांनी आधी लक्ष्मी गॅस एजंसीचे कार्यालय गाठले. परंतु तेथे प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी जिल्हाकचेरी गाठली.याठिकाणी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश उर्वरित. पान ४
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सोलापूर- अजमेर- सोलापूर (०९६२७- ०९६२८) विशेष सुपरफास्ट रेल्वेगाडीला जेऊर (ता. करमाळा) रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा देण्याची मागणी केली खासदार मोहिते पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, जेऊर रेल्वे स्थानक करमाळा, जामखेड, परंडा तसेच कर्जत- राशिन परिसरासाठी अत्यंत सोयीचे असून या भागातील नागरिकांच्या प्रवासासाठी ते महत्त्वाचे केंद्र आहे. या परिसरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या मोठी असून अजमेर येथील प्रसिद्ध दरगाह शरीफ येथे दर्शनासाठी अनेक भाविक नियमितपणे प्रवास करतात. तसेच जेऊरपासून सुमारे ३० किमी अंतरावर आवाटी येथे अलहजवली चाँदपाशावली यांची प्रसिद्ध दरगाह असून देशभरातून हजारो भाविक येथे येत असतात. याशिवाय सूरत येथील मोठ्या होलसेल कापड बाजारामुळे व्यापारी वर्गांचीही मोठी ये- जा सुरू असते. राजस्थानमधील कामगार तसेच पर्यटनासाठी जयपूरसह विविध ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची संख्या देखील लक्षणीय आहे. सोलापूर विभागातून अजमेरसाठी ही एकमेव थेट रेल्वेगाडी उपलब्ध असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीला जेऊर स्थानकावर आगमन-प्रस्थानाचा अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी विनंती खासदारांनी केली आहे.
यंदा डॉ. आंबेडकर जयंती डिजेमुक्त साजरी करावी:पंढरपुरात जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न
भारताचे संविधान निर्माता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी दि. १४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त रखुमाई सभागृह पोलिस संकुल, पंढरपूर येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंढरपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते. जयंती निमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, सहा.पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे, पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे, टी.वाय.मुजावर, रेखा घनवट, सहा. पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, नगर अभियंता केसकर, महावितरणचे अधिकारी तसेच शहरातील व तालुक्यातील जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्ते व पोलीस पाटील उपस्थित होते. या बैठकीत डॉ. आंबेडकर जयंती डिजेमुक्त, शांततामय आणि उत्साही वातावरणात साजरी करावी. जयंती अनुषंगाने लावण्यात येणारे पोस्टर, बॅनर, झेंडे हे परवानगी घेऊन व योग्य ती खबरदारी घेऊन लावावे. तसेच ते आक्षेपार्ह असु नयेत याची दक्षता घ्यावी, मिरवणूक काढण्यापूर्वी किमान तीन दिवस अगोदर परवाना घेणे बंधनकारक आहे.
कुर्डवाडी नगरपरिषदेने सण २०१६- १७ मध्ये शहरामध्ये माढा, पंढरपूर, बार्शी, पंढरपूर रोडसह शहरामध्ये २५०० एलएडी पथदिवे ५० व्याटपासून १०० व्याटपर्यत बसवले आहेत. तर ८० हायमास्ट दिवे १५० ते २०० व्याटचे शहरात बसवण्यात आले. सदर दिवे बसवण्याचे काम दिल्लीच्या केंद्रीय इ- सेल कंपनीने केले असून संबंधित पथदिवे आणि हायमास्ट दिव्यांची देखभाल करण्याचा ३ ते ४ वर्षाचा कालावधी होता. मात्र कंपनीने काम अनेक महिन्यापासून अपूर्ण ठेवल्याने शहरातील रस्ते आजतगायत अंधारातच आहेत. शहरातील रस्त्यामध्ये प्रामुख्याने बार्शी- माढा, पंढरपूर रोडवर बसवण्यात आलेले पथदिवे नुसतं शोपीस असल्यासारखे दिमाखात दिवसा उभे आहेत. तर रात्री रस्ते पूर्णपणे अंधारमय असतात. यामुळे नागरिक अंधारातून मार्ग काढत आहे. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन चौक, मिठाई गल्ली बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर समोरच्या मार्गावर तर गेल्या २ वर्षापासून एलएडी विना केवळ खांबच उभे आहेत. उच्च दर्जाच्या पथदिवे आणि हाय मस्टची देखभाल दुरुस्तीचे काम इसेल कंपनीचे होते. परंतु काम सुरु केल्यापासून काम संपले. तरी शहरात काही ठिकाणी दिवे दिवसा उजेड देतात. तर काही भागात रात्री बंद असतात. वास्तविक पाहता कंपनीकडून काम अपूर्ण राहण्याचे कारण संशोधनाचा विषय असून मोठं आर्थिक रहस्य लपलं आहे. २५०० पथदिव्यांपैकी निम्म्याहून अधिक प्रमाणात अनेक भागांमध्ये पथ दिवे बंद असतात आणि हाय मस्टचे चार फोकस ऐवजी एकच सुरु असतो. रात्री रस्त्यावरून गल्लीबोळातून जाताना नागरिकांना भीती माढा बार्शी पंढरपूर रोडवरचे जवळपास निम्म्याहून अधिक पथदिवे गेल्या अनेक वर्षापासून बंद आहेत. या मार्गावरून शहरातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक रात्री दिवसा ये- जा करतात. पण सदरील पथ दिव्यांबाबत कोणच ब्र शब्द काढत नसल्यामुळे केंद्रीय विभागाचा अपुरा प्रकल्प गुमान नागरिक सहन करत आहेत. रेल्वेचे महत्वाचे जंक्शन आहे. शहरात रात्री प्रवाशांसाठी येतात पण रेल्वे स्थानकांमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करतात. नगरपरिषद विद्युत विभागाने सर्व पथदिवे हाय मस्ट सुरू असल्याचा दावा केला असून केवळ दहा टक्के दिव्यांचे काम राहिले असल्याचे सांगितले. भीती वाटत आहे. याकडे नगरपरिषद विद्युत विभाग लक्ष देणार आहे का, असा प्रश्न नियमित नगरपरिषदेचा कर भरणारे नागरिक विचारत आहेत. मात्र रात्रीच वास्तव विदारक आहे.लाखो रुपये खर्च करून शहर प्रकाशमय नाही. नुसताच मिणमिणता उजेड रारी असतो. बार्शी- माढा पंढरपूर रोडवरचा अंधार विद्युत विभागाच्या दुर्लक्ष पणामुळे आहे का, अन्य कारण आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. यामुळे चोरी आणि अपघात होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने बार्शी रोडबाबत नगरपरिषद प्रशासन आणि पदाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत. पंढरपूर रोड बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची गत रात्री वाईटच आहे. शहरातील सर्व पथदिवे चालू करण्याची मागणी ^कुर्डूवाडी शहरातील मोठ्या प्रमाणात बसवण्यात आलेले पथदिवे हायमस्ट रात्री अल्प उजेड देतात. काही ठिकाणी दिवे नाहीत. त्यामुळे नागरिकांना रात्री भीती वाटते. न.पा. प्रशासनाने तात्काळ पथदिवे हाय मस्ट सुरळीत करावे. आनंद टोणपे, नागरिक
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओची माहिती झिरवाळ यांना आधीपासूनच होती आणि यासंदर्भात त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चाही केली होती, अशी माहिती मिळत आहे. मात्र, ही चर्चा होऊन २४ तास उलटण्यापूर्वीच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने झिरवाळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नरहरी झिरवाळ यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ सुमारे सात महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येते. मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील एका खोलीत झिरवाळ एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत बिछान्यावर बसलेले असून शेजारी मद्य आणि खाद्यपदार्थ दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसणारा तृतीयपंथी पवन यादव असून, त्याच्यावर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या मंत्र्यांच्या शासकीय निवासात अशा प्रकारची व्यक्ती असणे आणि तिथे अश्लील कृत्य होणे, यावरून आता नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षातील गटबाजी? राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर पक्षात नेतृत्वावरून आणि मंत्रिपदावरून मोठा संघर्ष सुरू आहे. झिरवाळ यांनीच सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्याची मागणी केली होती. तसेच, दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करण्याबाबत अजितदादा सकारात्मक होते, असा दावाही त्यांनी केला होता. मंत्रिमंडळातील त्यांच्या जागेवर डोळा असलेल्या पक्षातीलच काही हितशत्रूंनी त्यांना जाळ्यात ओढले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसकडून हकालपट्टीची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. अशा कलंकित मंत्र्याला पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. दोन महिन्यांपूर्वीच झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला ३५ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले होते, तेव्हापासूनच ते विरोधकांच्या निशाण्यावर होते. या संपूर्ण प्रकरणावर नरहरी झिरवाळ यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या स्वीय सहायकाशी संपर्क साधला असता, साहेबांना या विषयावर सध्या काहीही बोलायचे नाही, असे सांगण्यात आले. झिरवाळांवर संकटांची मालिका, तिसरा बळी ठरणार? नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत गेल्या काही काळापासून सतत वाढ होत आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या कार्यालयातील लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. आता तृतीयपंथीसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने झिरवाळ चर्चेत आहेत. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. याआधी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने मंत्रिपद सोडावे लागले होते. तर अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकरणकर यांना राज्य महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता व्हिडिओ प्रकरणामुळे झिरवाळ यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यास, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे मंत्री ठरतील.
तत्कालीन बार्शी लाइट रेल्वेच्या (बीआरएल) कर्मचाऱ्यांनी एक- एक रुपया गोळा करून तर कधी झोळी फिरवून जमा केलेली वर्गणी आणि श्रमदानातून कुर्डुवाडी शहरातील रेल्वे कॉलनीत उभारण्यात आलेले श्रीराम मंदिर यंदा १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे. अठरा पगड जाती धर्मातील रेल्वे कर्मचाऱ्यांची भक्ती अन् श्रद्धेचे प्रतीक असलेले आणि ब्रिटिशकालीन आठवणी सांगणारे हे मंदिर आजही दृढतेने दिमाखात उभे आहे. शताब्दी वर्षानिमित्त रामनवमीसह वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १८८६ मध्ये बार्शी लाइट रेल्वेची स्थापना झाली. त्यानंतर कुर्डुवाडी- बार्शी पहिली रेल्वे १८९३ मध्ये धावली. दरम्यान, कुर्डुवाडीत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी पाच व बारा कोठरी अशा प्रकारची घरे (आताची रेल्वे कॉलनी) उभारण्यात आली. रेल्वे कर्मचारी कामानंतर भजन व इतर अध्यात्मिक कार्यात वेळ देत असत. तेव्हाचे दत्त आणि गणेश मंडळांनी रेल्वे वसाहतीत एखादे मंदिर असावे, अशी मागणी लावून धरली. तत्कालीन ऑफिस सुपरीडंट दत्तात्रय आजरेकर यांनी बार्शी लाइटचे रेल्वे अधिकारी जे.डब्ल्यू. इव्हन (एजंट) यांच्याकडून प्रस्ताव देऊन मंदिरासाठी मंजुरी मिळवली आणि कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर १५० बाय १५० चौरस फूट जागेवर मंदिराची उभारणी झाली. १९२६ मध्ये हिंदू देवालय संस्था (रजिस्टर नंबर १४७) नावाने संस्थेची स्थापना झाली. १९३० मध्ये कै. महादेव कुंटे यांनी दिलेल्या राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. रेल्वे कर्मचारी व इतर मंडळीच्या आर्थिक सहकार्य आणि श्रमदानातून पुढे श्रीराम मंदिर गाभारा, मारुती मंदिर गाबारा आणि सभामंडप तयार झाले..मंदिरात दहा दिवस रामनवमी, दत्त जयंती, कृष्ण जन्माष्टमी, दास नवमी आदी उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. शिवाय सामाजिक कार्यही मंदिराचे मोठे योगदान राहिले आहे.मंदिर हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषयरेल्वे कर्मचाऱ्याकडून मासिक वर्गणीतून इतर देणगीतून मंदिराचे कामकाज चालते. प्रभू श्रीराम मंदिराच्या शताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रम, मंदिराला ऊर्जितावस्था आणणार ^कुर्डुवाडी शहरात १०० वर्षांचे श्रीराम मंदिर हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या शंभर वर्षांत श्रीराम मंदिराच्या साक्षीने अनेक पिढी घडल्या.आता रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बदलीने मंदिराचे काम म्हणावे तसे होत नाही. सर्वांच्या मदतीने मंदिराला ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न आहे. श्रीराम मंदिराच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम करण्याचे नियोजन केले आहे. -अश्विनी जोशी- कुलकर्णी
स्वतःला अंकशास्त्राचा महान तज्ज्ञ आणि 'कॅप्टन' म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याच्या भूलथापांना मोठे राजकीय नेते आणि अधिकारी बळी पडले असले, तरी त्याचा खरा भूतकाळ आता समोर आला आहे. शालेय जीवनात गणितात अवघे २८ गुण मिळवून नापास झालेला हा 'अंकशास्त्रज्ञ' त्याच्या वावी गावात 'कोंबडी चोर' म्हणून ओळखला जात होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता १० गुन्ह्यांचा एकत्रित तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) वर्ग करण्यात आला आहे. अशोक खरात याने आपल्या 'अंकशास्त्रा'च्या जोरावर अनेकांना भुरळ घातली होती. मात्र, प्रत्यक्षात तो दहावीच्या परीक्षेत गणित विषयात नापास झाला होता. वावी येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकत असताना त्याचे वर्तन अत्यंत वादग्रस्त होते. घरून अंडी चोरून ती शाळेत विकणे, यासारख्या उद्योगांमुळे त्याला परिसरात 'कोंबडी चोर' किंवा 'मोटर चोर' म्हणून हिणवले जायचे. याच शाळेतील वर्तमान विद्यार्थ्यांनी खरातच्या कृत्यांमुळे आमच्या शाळेची नाहक बदनामी झाल्याची खंत व्यक्त केली आहे. हमाल ते कॅप्टन: फसवेगिरीचा मोठा प्रवास खरातने केवळ ज्योतिषशास्त्रातच नव्हे, तर आपल्या पेशाबाबतही खोटे दावे केले होते. मर्चंट नेव्हीमध्ये तो 'हमाल' किंवा खालच्या श्रेणीतील कामगार म्हणून रुजू झाला होता. पाच-सात वर्षांनंतर गावात परतल्यावर त्याने स्वतःला 'कॅप्टन' म्हणवून घेण्यास सुरुवात केली. त्याच्या या बनावट ओळखीला भुलून अनेक प्रभावशाली व्यक्ती त्याच्या जाळ्यात अडकल्या, याबद्दल तरुण पिढीने आणि विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त करत सुशिक्षित समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्व १० गुन्हे एसआयटीकडे वर्ग भोंदू अशोक खरात विरुद्ध दाखल झालेले सर्व गुन्हे आता 'एसआयटी'च्या माध्यमातून तपासले जाणार आहेत. यामध्ये नाशिकमधील ८, तर वावी आणि सिन्नरमधील प्रत्येकी एक अशा एकूण १० गुन्ह्यांचा समावेश आहे. काल रात्रीच एसआयटीच्या पथकाने नाशिक गुन्हे शाखेकडून लॅपटॉप, डीव्हीआर, सीसीटीव्ही फुटेज आणि महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. डिजिटल पुराव्यांवर पोलिसांचा भर खरातने आपल्या मोबाईलमधील अनेक संवाद आणि व्हॉट्सॲप डेटा नष्ट केल्याचा संशय पोलिसांना आहे. हा डेटा पुन्हा मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. खरातने नेमक्या कोणाकोणाशी संवाद साधला होता आणि यामागे आणखी मोठे मासे अडकले आहेत का, याचा शोध आता एसआयटी घेणार आहे. हे ही वाचा… भोंदू खरातवर 5 कोटी रुपयांना गंडा घालण्याचाही गुन्हा दाखल:पुण्याच्या व्यावसायिकाला दाखवले होते परिसाच्या शक्तीचे आमिष लॉजिस्टिक व्यवसायात प्रगती करण्यासाठी ‘अवतार पूजा’ आणि ‘परिसाची शक्ती’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून भोंदू अशोक खरातने पुण्याचे व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना २०१८ ते २५ कालावधीत तब्बल ५ कोटी रुपयांचा गंडा घातला. “पूजा केली नाही तर नागदेवता दंश करेल. त्यात तुमचा मृत्यू होईल,” अशी भीती दाखवून खरातने जासूद यांच्याकडून ९० लाखांची मर्सिडीज कार (एमएच १५ जीएल ८१८१) आणि अमेरिकेतील उपचारांचा खर्चही उकळला. सविस्तर वाचा…
शहरात दररोज गरजूंना मिळणार मोफत भोजन:स्व. अरुणकाका जगताप अन्न छत्रालयाला प्रारंभ
माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त काका ट्रस्टच्यावतीने स्व. अरुणकाका जगताप अन्न छत्रालयाचा शुभारंभ जैनमुनी अलोकऋषीजी महाराज व ग्रामदैवत श्री विशाल गणपती देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज यांच्या हस्ते झाले. मार्केटयार्ड जवळील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयासमोरील नागेश्वर महादेव मंदिरात हे अन्नछत्रालय सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत गरजूंना मोफत भोजन मिळणार आहे. यावेळी पार्वतीबाई जगताप, महापौर ज्योती गाडे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, आ. संग्राम जगताप, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप, सुवर्णा जगताप, माजी नगरसेविका शीतल जगताप आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी स्व.अरुण जगताप यांच्या स्मृतींना व केलेल्या कार्याचे स्मरण केले. यावेळी अरविंद शिंदे, राजेंद्र चोपडा, सुहास मुळे, ज्ञानेश्वर रासकर, सुमतीलाल कोठारी, भगवान फुलसौंदर, विजय परदेशी, अजय फुंदे, गणेश कवडे, अविनाश घुले व अनिल मोहिते आदींनी मनोगत व्यक्त करून स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मृती जागवल्या.आमदार संग्राम जगताप म्हणाले, स्व. अरुणकाका जगताप यांनी कायम अन्नदानाला महत्त्व देत विविध उपक्रम राबवले. त्यांच्या पश्चात हा वारसा अखंडितपणे पुढे नेण्यासाठी तसेच गरजूंना मदत व्हावी या उद्देशाने सुरु केलेले हे मोफत अन्नछत्र अखंडितपणे दररोज सुरू राहणार आहे. स्व. अरुणकाकांच्या प्रथम वर्षश्राद्ध दिनी दि.२१ एप्रिल रोजी मोठ्या स्वरूपात अध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे सध्या प्रशासनाच्या कारभारावरून नवा वाद निर्माण झाला आहे. विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतर प्रशासक मंडळाकडे कारभार असताना रस्त्यावर लावण्यात आलेल्या बॅरिकेट्समुळे स्थानिक व्यवसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पूर्वी शनिशिंगणापूरमध्ये प्रवेश करताच तथाकथित ‘लटकू’ वाहनधारकांकडून शनिभक्तांचा पाठलाग करून पूजा साहित्य खरेदीसाठी जबरदस्ती केली जात होती. या प्रकारामुळे भाविक त्रस्त झाले होते. तसेच भरधाव मोटारसायकलींमुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आणि प्रशासनाने एकत्र येत कारवाई करत रस्त्यावर उभे राहून अडथळा निर्माण करणाऱ्या लटकूंना आळा घातला. या निर्णयाचे भाविक आणि स्थानिकांकडून स्वागतही झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती वेगळीच वळण घेताना दिसत आहे. शनिशिंगणापूरमधील खासगी पार्किंगकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या मधोमध पोलिस प्रशासनाने बॅरिकेट्स उभारले आहेत. यामुळे पूजा साहित्य दुकाने, नाश्ता केंद्रे, नारळपाणी, फळ विक्रेते तसेच लॉजिंग व्यवसायिकांकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. या अडथळ्यामुळे खासगी पार्किंग परिसरातील शेकडो व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “व्यवसाय ठप्प झाला आहे, कर्जाचे हप्ते कसे भरायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा?” असा प्रश्न व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक पोलिस प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही वरिष्ठांच्या आदेशानुसार बॅरिकेट्स लावले आहेत असे उत्तर मिळत असल्याचा आरोप व्यवसायिकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
रक्तदान हे मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ असे कर्तव्य असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा या रक्तदान शिबिरामधील सहभाग समाजाला दिशादर्शक ठरणारा आहे, असे प्रतिपादन न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी केले. न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमधील रसायसनशास्त्र विभाग आणि जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर व थॅलेसेमिया तपासणी शिबीर पार पडले. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील तसेच इतर विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्राचार्य सागडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. अनिल आठरे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय कळमकर, प्रबंधक बबनराव साबळे, रसायनशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्रा. सुषमा दरे, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. वसंत झेंडे, थॅलेसेमिया आजाराबाबत समाजामध्ये जनजागृती मोहिम राबविणारे डॉ. गौरव पठाडे, डॉ. अॅड. अंजली केवळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रसायनशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्रा. सुषमा दरे यांनी महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य रुजली जावीत या हेतूने अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन विभागामार्फत नेहमीच करण्यात येत असल्याचे सांगितले. या रक्तदान शिबिरास अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव अॅड. विश्वासरावजी आठरे, सहसचिव मुकेश मुळे, खजिनदार अॅड. दीपलक्ष्मी म्हसे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आभार शिबिराचे समन्वयक प्रा. अविनाश करंडे यांनी केले. महाविदयालयातील रसायनशास्त्र विभागातील तसेच इतर विदयाशाखेतील पदवी, पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांनी तसेच महाविदयालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी रक्तदान शिबीरामध्ये उत्स्फुत सहभाग नोंदविला.
अमेरिका-इराण युद्धाची गॅसपासून सुरु झालेली टंचाईची झळ आता पेट्रोल-डिझेलपर्यंत येऊन पोहचली आहे. १६ दिवसांपासून घरगुती गॅससाठी रांगेत असलेले ग्राहक बुधवारी शहरातील विविध पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल घेण्यासाठी रांगेत उभे होते. इंधन संपण्याच्या भीतीने ग्राहकांनी सकाळपासूनच पंपांसमोर रांगा लावल्या. दुपारनंतर मात्र शहरातील बहुतांशी पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याचे फलके लावण्यात आली होती. युद्धामुळे पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, या धास्तीने मंगळवारी रात्रीपासून ग्राहकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. बुधवारी सकाळपासून पंपांवर एकच झुंबड उडाली. प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर -पुणे रस्त्यावरील पेट्रोल पंपांवर ग्राहकांनी गर्दी केली. त्यामुळे या रस्त्यावरील पंपावर दुपारनंतर पेट्रोल नसल्याचे फलके लावण्यात आली. त्याचबरोबर तपोवन रोड नवनागापूर, कल्याण रोड, सर्जेपुरा, उपनगरातील सावेडी, केडगाव, भिंगार, बोल्हेगाव परिसरातील पेट्रोल पंपांवर देखील ग्राहक पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी रांगेत होते. उद्या पेट्रोल मिळेल की नाही या शंकेनेच झाली गर्दी पेट्रोल-डिझेल संपणार असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर ग्राहक पंपांवर गर्दी करू लागले होते. उद्या पेट्रोल मिळेल की नाही? या शंकेने ग्राहकांनी क्षमतेपेक्षा अधिक पेट्रोल-डिझेल आपल्या वाहनांमध्ये भरून घेतले. त्याचा परिणाम २४ तासाला एका पेट्रोलपंपावर लागणारे इंधन ८ ते ९ तासांतच संपले. त्यामुळे शहरातील पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा जाणवत होता. निम्या पंपावर तुटवडा ^ जिल्ह्यात सुमारे ४०० पंपांपैकी निम्म्या पंपांवर इंधन तुटवडा निर्माण झाला. या तुटवड्यामागे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) दरात झालेली वाढ हे प्रमुख कारण मानले जात आहे. वाढत्या खरेदीदारांमुळे विद्यमान दरात इंधन विक्री करणे तेल कंपन्यांना परवडत नसल्याची स्थिती आहे. त्याचवेळी सरकारकडून इंधन दरवाढीवर नियंत्रण असल्याने कंपन्यांवर आर्थिक ताण वाढत आहे. या परिस्थितीचा परिणाम म्हणून इंधन वितरणात कंपन्यांकडून अनियमितता दिसून येत आहे. - डॉ. स्वाधिन गाडेकर, अध्यक्ष अहिल्यानगर, जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशन. अफवांवर विश्वास ठेऊ नये शहरासह जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे ग्राहकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. पेट्रोल-डिझेल पुरेसे असल्यामुळे ग्राहकांनी गर्दी करण्याची आवश्यकता नाही, असा दावा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी दिव्य मराठी'शी बोलताना केला आहे.
नामपूरमधील बसस्थानक ते शिवमनगर रस्त्याची दूरवस्था:पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांतर्फे आंदोलनाचा इशारा
शहरातील सर्वाधिक वर्दळीचा राज्यमार्ग असलेल्या येथील मध्यवर्ती बसस्थानक ते शिवमनगरपर्यंतच्या एक किलोमीटरच्या रस्त्यावर तुंबलेले पाणी, रस्त्यावरून उडून गेलेले डांबर, जागोजागी खोलखोल खड्डे, दुभाजकांची झालेली दूरवस्था आदी बाबींमुळे रस्ता जीवघेणा बनला आहे. गेल्या वर्षभरापासून सातत्याने तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेल्या एक वर्षापासून नामपूर परिसरात चिराई ते नामपूर, नामपूर ते वडनेर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम जोमाने सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे. नामपूर बसस्थानक ते लखमापूर या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम मात्र संथगतीने सुरू आहे. नामपूर बसस्थानकापासून हॉटेल ललकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रवेशद्वार, पेट्रोलपंपाजवळ, तुळजाई ट्रेडर्स, वंदे मातरम् पॉईंट, जिल्हा परिषदेच्या शाळेचे प्रवेशद्वार, आदिवासी वस्तीपर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. रस्त्यालगत जिल्हा परिषदेच्या शाळेतील लहान मुले ये-जा करत असतात. रस्त्याची दुरुस्ती न केल्यास मालेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा नारायण सावंत, चारुदत्त खैरनार, सचिन अहिरराव, सुनील निकुंभ, योगेश जगताप आदींनी दिला आहे.
वाढत्या कर्करोगाच्या धोक्याला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, या मोहिमेंतर्गत सटाणा ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी ‘एचपीव्ही” लस विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप भगत यांनी केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पहिल्या टप्प्यात १४ वर्षे पूर्ण झालेल्या, परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलींना ही लस दिली जात आहे. ही लस भविष्यात होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका ९० ते १०० टक्क्यांपर्यंत कमी करण्यास प्रभावी ठरते. हे लसीकरण पूर्णतः ऐच्छिक असून, त्यासाठी पालकांची संमती अनिवार्य आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून, काही मुलींना लसीकरणानंतर हलका ताप किंवा टोचलेल्या जागी सूज येऊ शकते; मात्र ही लक्षणे २ ते ३ दिवसांत आपोआप कमी होतात. यासाठी ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचे पथकही तैनात करण्यात आले आहे. गर्भाशयमुखाचा कर्करोग हा महिलांमधील मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. वेळेत लसीकरण केल्यास हा धोका टाळता येतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या १४ वर्षांच्या मुलींचे लसीकरण करून त्यांना सुरक्षित भवितव्य द्यावे, असे आवाहन डॉ. संदीप भगत यांनी केले. या मोहिमेत “गार्डासिल-४” या लसीचा केवळ एक डोस (०.५ मिली) दिला जात आहे. ही लस डाव्या हाताच्या दंडातील स्नायूमध्ये दिली जाते. लसीकरणाची नोंदणी केंद्र सरकारच्या पोर्टलवर डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असून, लाभार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्रही दिले जाईल.
भारतीय समाजात चिकित्सा करणे, प्रश्न विचारणे हे पाप ठरवले आहे. संशोधकीय दृष्टिकोनाचा अभाव असल्याने सामाजिक फसवणुकीचे गुन्हे घडत असून त्यात वाढ होत आहे, असे मत डॉ. प्रतिभा अहिरे यांनी व्यक्त केले. शिवाजी महाविद्यालयात सोशल सायन्स क्लबच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘सामाजिक संशोधन पद्धती आणि आजचा समाज’ या विषयावर डॉ. अहिरे यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, मानवाने आज विविध क्षेत्रांत जी प्रगती साध्य केली आहे, त्यामागे मानवाची चिकित्सक, संशोधक वृत्ती आहे. प्रश्न विचारण्यातून शोधाला प्रारंभ होतो. त्यातून संशोधनाला चालना मिळते. भारतीय समाजात ही संशोधकीय वृत्ती विकसित करण्यासाठी धर्म, समाज यांचा अडथळा आहे. वर्तमान शिक्षण पद्धतीतही संशोधनाला फाटा देण्यात येत आहे. संशोधक वृत्तीचा समाज निर्माण झाल्यास सामाजिक आणि असामाजिक यातील फरक समजण्यास मदत होते. वैज्ञानिक दृष्टिकोनाअभावी नाशिक येथील कॅप्टन खरात महिला, राजकारण्यांचे सहज शोषण करू शकला. डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून सत्य स्वीकारणारा समाज निर्माण करण्यासाठी सामाजिक संशोधन पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे. संशोधनाच्या पायऱ्या, त्याचे हेतू, निष्कर्ष यासह विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रकल्प सिद्ध करावे, असे आवाहनही त्यांनी केले. अध्यक्षस्थानी डॉ. रणजित पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून जलतज्ज्ञ डॉ. संजय भालेराव, प्रा. के. एल. भानुसे, डॉ. अलका गडकरी, डॉ. सीमा काशीद, डॉ. सीताराम मोगल, डॉ. पी. बी. महाजन, प्रा. सुनील गोरडे, प्रा. सोमेश मोगरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमास अभिषेक जंजाळ, जयकुमार कदम, रोशन राठोड , साक्षी धनेधर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पूजा चव्हाण यांनी तर रवीना चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ..तर प्रगतीची गती वाढेल सोशल सायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. बी. जी. देशमुख यांनी केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांत संशोधन, चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी सोशल सायन्स क्लब कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक, प्रशासकीय अशा सर्वच क्षेत्रांत सामाजिक संशोधन पद्धती अप्लाय केली तर प्रगतीची गती वाढल्याशिवाय राहणार नाही. समाजाच्या उपयोगाचे संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे.
रामनवमी उत्सवानिमित्त शहरापासून जवळच असलेल्या हिवरखेडा (गौताळा) शिवारातील श्री नित्यानंद धाम संस्थान येथील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ८ ते १०:३० पर्यंत सुंदर कांड, सकाळी ११ ते १२:३० अभिषेक, पूजा, महाआरती व महाप्रसाद भंडारा होणार आहे. सायंकाळी रतलाम (मध्य प्रदेश) येथील राधेशाम पाटीदार व भजनी मंडळाकडून सुंदरकांड व भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंढरीनाथ काळे | फुलंब्री लोहगड नांद्रा येथे वनवासाच्या काळात सीतामाता या डोंगरावर राहिल्या असून त्यांनी येथेच लव-कुशांना जन्म दिल्यामुळे या डोंगराचे नाव लहूगड पडले असल्याची आख्यायिका सांगितली जात आहे. येथे राम, सीता, लक्ष्मण व लव-कुश हे वास्तव्यास असल्याच्या खुणा असल्याची माहिती दादा महाराज बारबैले यांनी दिली आहे. लोहगड नांद्रा गडावरील स्वयंभू रामेश्वर महादेव मंदिर आहे. हेच लव-कुश यांचे जन्मस्थळ असून नांद्रा गावाजवळ लोहगड नावाचा मोठा डोंगर आहे. प्रभू रामचंद्राने बांधलेले हे स्वयंभू महादेव मंदिर असल्याने या मंदिराला रामेश्वर नाव पडल्याची आख्यायिका सांगितली जाते. राम वनवासातून परतल्यावर सीतेचे रावणाने अपहरण केले. अनेक दिवस ती दुष्ट रावणाच्या लंकेत राहिली. नंतर शंका-कुशंकांमुळे रामाने सीतेला वनवास दिला. याच डोंगरावर महर्षींचा आश्रम होता. या आश्रमात सीतामातेने लव-कुश यांना जन्म दिल्याचे सांगितले जाते. प्रतिनिधी | पैठण/फुलंब्री रामनवमीनिमित्ताने आज, गुरुवारी (दि. २६) ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरांत भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. पैठणला सायंकाळी ५ वाजता शोभायात्रा काढली जाणार आहे. फुलंब्री तालुक्यातील लोहगडनांद्रा येथे राम, सीता, लक्ष्मण व लव-अंकुश हे वास्तव्यास असल्याची आख्यायिका सांगितली जात असून येथे महिला लव-अंकुशचे पाळणे गाणार आहेत. पैठणला काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी पैठणमध्ये सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रामनवमी निमित्ताने सकाळपासूनच भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी होणार आहे. राम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शोभायात्रेदरम्यान विविध देखावे, ढोल-ताशा पथके, भजन मंडळे यांचे आकर्षण असणार आहे. शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. पोलिस प्रशासनाकडूनही बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. रामभक्तांमध्ये शोभायात्रेबद्दल विशेष उत्साह असून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याचे नीलेश परदेशी यांनी सांगितले. शहरातील खंडोबा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत ही शोभायात्रा दोन तास चालली. सीतामाता येथे अंघोळ करायची म्हणून सीतामाता न्हाणी म्हणूनही येथील जागा ओळखली जाते. तसेच लव-कुश खेळणारी जागा इथे बघायला मिळते. तसेच लक्ष्मणाने बाण मारून तयार केलेले पाण्याचे कोरीव दगडी हौद आजही तसेच असून तेथे बाराही महिने पाणी असते. रामनवमीनिमित्त लोहगड नांद्रा येथील रामेश्वर मंदिरात सकाळी विधिवत पूजा करण्यात येणार असून येथे लव-कुश यांचे महिलांच्या वतीने पाळणे गायले जाणार आहेत. तसेच दुपारी बारा वाजता रामेश्वर महादेव मंदिरात महाभिषेक तसेच महाआरती करण्यात येणार आहे. सकाळी पूजा, दुपारी आरती
गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांना आंदोलनाला जाताना अडवले
गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे हे फाटलेली रासायनिक खताची बॅग अंगात घालून छत्रपती संभाजीनगर येथील पोलिस आयुक्त कार्यालयावर आंदोलनासाठी बुधवारी जाताना पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना माघार घेण्यास भाग पाडले. शुक्रवारच्या वादळी पावसानंतर आमदार अनुराधा चव्हाण यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी यांना सोबत घेत रविवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. त्या वेळी मंगेश साबळे यांनी सोशल मीडियावर फक्त कार्यकर्त्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले, असा आरोप केला होता. शिवाय आमदार अनुराधा चव्हाण यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. या प्रकरणी फुलंब्री तालुका भाजपने वडोदबाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तहसीलदारांना निवेदन दिले होते. या पार्श्वभूमीवर मंगेश साबळे हे बुधवारी आळंद-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरून पोलिस आयुक्त कार्यालयाकडे आंदोलनासाठी निघाले होते. फुलंब्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सहाने, वडोदबाजार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील इंगळे यांनी चौका घाटात जाऊन त्यांची समजूत काढली. तुमचेही म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे सांगितले.
पिंपळदरी परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचा उन्हाळी मिरची लागवडीकडे कल दिसत आहे. गेल्या वर्षी मिरचीला रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. भावही कमी मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. ही निराशा झटकून यंदा चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकरी पाण्याच्या उपलब्धतेनुसार मिरची लागवड करत आहेत. सिल्लोड तालुक्यातील आनाड, बाळापूर, पिंपळदरी, गोळेगाव, धोत्रा, पानवडोद, शिवणा, पानस, डिग्रस, सराटी, बोदवड, लिहाखेडी, खंडाळा, वसई, जळकी, अंभई, उंडणगाव भागांत मान्सूनपूर्व मिरची लागवडीसाठी शेतकरी सरसावले आहेत. परिसरात एप्रिलअखेर व मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर मान्सूनपूर्व मिरचीची लागवड होते. या पिकासाठी शेतकरी पाणी राखून ठेवतात. हवामान खात्याने यंदा अधिक पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावर्षी इतर पिकांना योग्य भाव मिळाला नाही. तरीही शेतकऱ्यांनी मिरचीचे उत्पादन कायम ठेवले आहे. गतवर्षीची भरपाई यावेळी होईल, असे शेतकऱ्यांना वाटते. मल्चिंग पेपर अंथरून मिरचीची लागवड केली जाते. त्यामुळे खर्च वाढतो. नांगरणी, रोटावेटरपासून मिरची निघेपर्यंत एका एकराला ९० हजार रुपये ते एक लाख रुपये खर्च लागतो. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मिरचीला मोठ्या प्रमाणात पाणी द्यावे लागते. ऊन जास्त असल्याने मिरचीवर थ्रिप्स आजार येण्याची शक्यता असते. त्यामुळे औषधांची फवारणी करावी लागते. सिल्लोड तालुक्यात शिवणा येथे मिरचीची मोठी बाजारपेठ आहे. दरवर्षी येथून पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, दिल्ली, मुंबई, मध्यप्रदेश, पुणे, अमरावती, नागपूर, कानपूर, छत्तीसगड, जबलपूर, रायपूर, गजरात, अहमदाबाद, छत्रपती संभाजीनगर यासह इतर राज्यात विक्री साठी पाठवली जाते. ^पिंपळदरी येथील शेतकरी मिरची लागवड मल्चिंगवरती करतात. यावर्षी एप्रिल ते मे दरम्यान लागवड केलेल्या मिरची पिकाला जून ते जुलै दरम्यान सुरुवातीला चांगला भाव मिळेल या अशेवर दहा हजार रोपे मिरची लागवड करणार आहे. -विष्ण दौड, शेतकरी, पिंपळदरी चांगला भाव मिळण्याची आशा
बोरगाव बाजार येथे झाले विविध प्रमाणपत्रांचे वाटप
सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत विशेष शिबिर मंगळवारी आयोजित करण्यात आले होते. महसूल विभागाच्या महत्त्वाच्या १५ सेवा एकाच छताखाली, थेट घरपोच मिळाव्यात. यासाठी राज्य सरकारतर्फे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान सुरू करण्यात आले असल्याचे सिल्लोड तहसीलदार संजय देवराय यांनी सांगितले. प्रलंबित फेरफार, भोगवटदार वर्ग २ जमीन वर्ग १ मध्ये घेण्याकरिता, तसेच मृत शेतकऱ्याच्या जमिनी त्यांच्या वारसांच्या नावे नोंदी घेण्याकरिता शेतकऱ्यांनी आवश्यक दस्तऐवज मंडळ अधिकारी यांच्याकडे जमा करावेत, अशा सूचना तहसीलदारांनी या वेळी केल्या. सोनाप्पावाडी जि. प. शाळेतील जवाहर नवोदय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. बोरगाव बाजार परिसरातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. रहिवासी, अधिवास, नॉन क्रीमी लेअर, जातीचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड अशी विविध प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. या वेळी नायब तहसीलदार तुकाराम बनकर, सरपंच सय्यद सत्तार, अर्जुन गाढे, केशवराव तायडे, अंबादास शिंदे, दत्ता चव्हाण, रब्बानी शेख, लक्ष्मण साखरे, श्याम अधिकार, काशीनाथ गोरे, श्रावण शिंदे, दिगंबर टाकसाळे हजर होते. गावच्या पहिल्या महिला पोलिसाचा सन्मान अपर्णा नंदू चव्हाण यांची धुळे पोलिस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाली असून त्यांचा जाहीर सत्कार या वेळी तहसीलदार संजय देवराय यांच्या हस्ते करण्यात आला. बोरगाव बाजार गावातून पहिल्या महिला पोलिस कॉन्स्टेबल होण्याचा मान अपर्णा चव्हाण यांनी मिळवला. गावातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांचा सन्मान गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
प्रलंबित महसूल प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी प्रशासन अधिक गतिमान झाले आहे, असे प्रतिपादन तहसीलदार सुनील सावंत यांनी केले आहे. लासूरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांना १५०० महसुली सेवांचा लाभ मिळाला आहे. लासूर गाव महसूल मंडळातील शेतकरी तसेच लाभार्थी नागरिकांना मंगळवारी (२४ मार्च) श्रीदेवी दाक्षायणी मंदिरातील लॉन्सवर वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत ५४ फेरफार निकाली काढण्यात आले. ७/१२ दुरुस्तीसाठी स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची संख्या २८ होती. अभियानांतर्गत ४६२ डिजिटल सातबारा उपलब्ध करून देण्यात आले. ८-अ उताऱ्यांची संख्या ४०२ होती. अभियानातून ११२ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. अभियानांतर्गत एक खिडकी योजनेत ४७२ विविध महसूल प्रकरणे निकाली काढण्यात आली. दरम्यान, शिबिरस्थळी गावकऱ्यांना १५ पेक्षा जास्त महसुली सेवांचा एका रांगेत लावण्यात आलेल्या टेबलद्वारे लाभ मिळाला आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सदस्या संगीताताई सुभाष तांबे, पंचायत समिती सदस्या अर्चनाताई अप्पासाहेब शेलार, राहुल शेळके, बाजार समितीचे संचालक रितेश मनोत, नायब तहसीलदार कुमावत, काकडे, सहायक गटविकास अधिकारी जायभाये, विस्तार अधिकारी राठोड आदींची उपस्थिती होती. नागरिकांच्या प्रलंबित महसूल प्रकरणांचा तत्काळ निपटारा करून प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्यावर या महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत भर देण्यात येत असल्याचे तहसीलदार सुनील सावंत यांनी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे शेतकरी, महिला, विद्यार्थी व गरजू लाभार्थींच्या अडचणी थेट शिबिरातच सोडवण्याचा हा लोकाभिमुख उपक्रम ठरत असल्याचेही सावंत यांनी सांगितले. रंजित देशमुख, पोलिस पाटील बाबासाहेब हरिचंद्रे, देवी दाक्षायणी मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक मंडळ अधिकारी रिता पुरी यांनी केले. आभारप्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी नानासाहेब राहिंज यांनी केले. शेतकरी, महिला, विद्यार्थी यांना मिळतोय दिलासा नागरिकांच्या प्रलंबित महसूल प्रकरणांचा तत्काळ निपटारा करून प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्यावर या महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत भर देण्यात येत असल्याचे तहसीलदार सुनील सावंत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शेतकरी, महिला, विद्यार्थी व गरजू लाभार्थींच्या अडचणी सुटत असल्याचे सावंत यांनी सांगितले.
शहरातील चिकलठाणा, जाफर गेट आणि शहानूरमियाँ दर्गा (पीर बाजार) येथील ऐतिहासिक आठवडी बाजार कायमचे बंद करण्याची घोषणा केली आहे. महापालिका स्थापनेपूर्वीपासून सुरू असलेले हे बाजार बंद करण्यामागे वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि पसरणारी अस्वच्छता ही मुख्य कारणे असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या बाजारांमध्ये दर आठवड्याला २५ ते ५० लाखांची उलाढाल होते. मात्र यामुळे रस्ते अडवले जात असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. रस्त्यावरील बाजार बंद करून हे विक्रेते आता मनपाच्या अधिकृत भाजी मंडईंमध्ये स्थलांतरित केले जातील. अस्तित्वात असलेल्या मंडईंची डागडुजी करून तिथे नवीन गाळे उभारले जातील. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा ३ हजार २२३ कोटी ९० लाख रुपयांचा ४६ वा मूळ अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्याकडे आयुक्त जी. श्रीकांत यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात ४७ लाख १५ हजार रुपयांची शिल्लक दर्शवण्यात आली असून प्रामुख्याने तंत्रज्ञान आणि नागरिकाभिमुख सुविधांवर भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पात सध्या मनपा भाडे आधारित कर पद्धतीने मालमत्ता कर आकारते. यामध्ये बदल करून रेडीरेकनरचा आधार घेऊन भांडवली मूल्य आधारित करप्रणालीचा अवलंब करण्याचा प्रस्ताव पुढील वर्षांसाठी ठेवण्यात आला आहे. ४३४.६८ कोटी रुपये शहरांतील नवीन विकासकामांसाठी केले जाणार खर्च करवसुलीमध्ये १८ ते ३० टक्क्यांपर्यत वाढ होणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले. यासोबतच मनपा प्रशासनात पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर आणि घरबसल्या सेवा देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. ६३६ कोटींच्या एकूण कामांपैकी ४३४.६८ कोटी रुपये शहरांतील नवीन विकासकामांसाठी प्रस्तावित आहेत. तृतीयपंथीयांच्या कौशल्य विकासासाठी पहिल्यांदाच २० लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. याप्रसंगी स्थायी समितीचे सर्व सदस्य, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. या अर्थसंकल्पाची तयारी मागील दीड महिन्यांपासून सुरू होती. २९ कर्मचारी काम करत होती. सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प २०४७ डोळ्यासमोर ठेवून विकासाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. शहर विकासाच्या दृष्टीने वाटचाल करण्याचा अर्थसंकल्प आहे. पहिल्या १० स्वच्छ शहरांत येण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. यातून शहराचा सर्वांगीण विकास करता येईल. -समीर राजूरकर, महापौर. डीपी रस्त्यासाठी निधी देणार मनपाने डीपी रस्त्यावरील अतिक्रमण काढले. मात्र रस्त्यासाठी निधीची शासनाकडे मागणी करावी लागत आहे. त्यामुळे डीपी रस्त्याच्या विकासासाठी नवीन लेखाशीर्ष तयार करण्यात आले असून त्यासाठी २० कोटींची तरतूद आहे. २०० कोटींच्या ग्रीन बाँडचा प्रस्ताव जलनिस्सारणासाठी मनपाचा हिस्सा भरावा लागणार आहे. यामुळे कर्ज न काढता २०० कोटी रुपयांचे ग्रीन बाँड काढण्यात येणार आहे. हे ग्रीन बाँड जारी केल्यास भारत सरकारकडून २० कोटी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून मिळेल. १० ईव्ही चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे १० ठिकाणी ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहेत. यामध्ये घरगुती व पार्किंग क्षेत्रासाठी स्लो चार्जिंग, व चार्जिंग स्टेशनवर फास्ट चार्जिंग स्टेशन उभारणी करण्यात येणार आहे. विभागीय आपत्कालीन केंद्र अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थापन विभागासाठी १६ कोटी ७१ लाखांची तरतूद केली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन केंद्र उभारणी, मनपा इमारतीसाठी अग्निरोधक उपकरणे लावण्यात येणार आहेत. आरोग्य विभाग एन-११ च्या रुग्णालयात आयुष अंतर्गत पंचकर्म, आयुर्वेद, योगा निसर्गोपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मनपा रुग्णालयात हाडांची ठिसूळता तपासणीसाठी मशीन खरेदी करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण विभाग मनपाच्या शाळांमध्ये अतिरिक्त खोली बांधकाम व क्रीडा पायाभूत सुविधांसाठी ५ कोटींची तरतूद केली आहे. मनपा शाळेत विदेशी भाषा शिकवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना एआय व रोबोटिक्स शिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्यांदाच रेडीरेकनरनुसार कर आकारणी भाडेमूल्य दरानुसार मालमत्ता कर आकाराला जात आहे. सध्या घरगुतीसाठी १९ रुपये प्रति स्क्वेअर मीटर तर व्यावसायिकसाठी ४७ रुपये प्रति स्क्वेअर मीटरप्रमाणे दर आकारला जात आहे. नवीन प्रस्तावानुसार प्रत्येक भागाच्या रेडीरेकनर दरानुसार मालमत्ता कर आकाराला जाणार आहे. यामध्ये प्रत्येक भागासाठी वेगवेगळे दर असणार आहेत. मॅपिंग आणि दरनिश्चितीची प्रक्रिया करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत होतील बदल अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला आहे. यावर ३० मार्च रोजी स्थायी समिती सदस्यांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बजेटमध्ये सदस्यांसाठी २५ लाख रुपये निधी देण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, तर सदस्यांनी सुचवलेली काही कामे यात समाविष्ट करण्यात येतील. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येऊ शकतो. शहरात एक प्रभाग एक उद्यान उद्यानाच्या विकासासाठी शहरात एक प्रभाग एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉटनिकल गार्डन, सिद्धार्थ उद्यान याचा विकास करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष प्राधिकरणाला ५ कोटींचा निधी देणार आहे. स्वच्छ शहरांत येण्यासाठी तरतूद देशातील पहिल्या दहा स्वच्छ शहरांत येण्यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. यासाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. शहराचा विकास करण्यासाठी टॅक्स वाढ आणि वसुली गरजेची आहे. त्यावर भर देण्यात येणार आहे. -जी. श्रीकांत, महापालिका आयुक्त . नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी मनपाने ८२२ कोटींचे कर्ज घेतले आहे. योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून लवकरच शहरात पाणी येईल. यामुळे नळाला आता स्मार्ट वॉटर मीटर लावले जाणार आहेत. कर्जाची परतफेड वेळेवर करण्यासाठी व योजना ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालवण्यासाठी पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याबाबतही आयुक्त श्रीकांत यांनी अर्थसंकल्पात शिफारस केली आहे. शहर विकासाचा अर्थसंकल्प सादर शहराला आणि स्थायी समितीला अपेक्षित असलेला विकासाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यावर आम्ही स्थायी समितीमध्ये सर्वजण चर्चा करून काही बदल असल्यास ते करून सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवणार आहोत. -अनिल मकरिये, सभापती, स्थायी समिती. क्रीडा विभाग क्रीडा विभागाला मनपाने ६१.२० कोटी एवढी तरतूद केली आहे. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज महानगरपालिका क्रीडांगण येथे ५० कोटी खर्च करून आंतराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्यातून उत्पन्न नो नेटवर्क भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाने खासगी एजन्सीकडून टँकर लावलेले आहेत. या माध्यमातून ८ कोटी रुपये उत्पन्न कमावण्याचा महापालिकेचा मानस आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात लॉकडाऊन लागण्याच्या अफवेने नागरिक आणि वाहनधारकांमध्ये घबराट पसरली आहे. या भीतीपोटी सकाळपासूनच शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकाच वेळी सर्वांनी टाक्या फुल्ल करून घेण्याचा सपाटा लावल्याने शहरातील ४८ पैकी ८ हून अधिक पेट्लो पंप ड्राय झाले होते. तर रात्री ११ वाजेपर्यंत शहरातील बहुतांश पेट्रोल पंपावरील इंधन साठा पेट्रोल पंपांवरील साठा संपला होता. दरम्यान, एकाच दिवशी १० लाख लिटर पेट्रोल-डिझेलची विक्री झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली. शहरात पेट्रोल आणि डिझेलचा १९ लाख लिटरची क्षमत आहे. दररोज १२ लाख लिटर इंधन शहरात येत असून पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. नागरिकांनी पॅनिक बुकिंग करू नये आणि आवश्यकतेपेक्षा जास्त इंधन भरून घेऊ नये.” सोबतच १२ हजार सिलिंडरचा पुरवठा होत असताना मागणी मात्र ६० हजारांवर पोहोचली आहे. ही अतिरिक्त मागणी केवळ भीतीपोटी होत असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रवीण फुलारी यांनी दिली. गॅस बुकिंगचा डोंगर जिल्ह्यात दररोज १९,१३० सिलिंडरचा पुरवठा होत असूनही बुकिंगचा आकडा तब्बल ६० हजारांच्या वर गेला आहे. लोकांच्या या पॅनिक बुकिंगमुळे यंत्रणेवर मोठा ताण येत असून गरजेनुसार गॅस उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या इंधन गोंधळाचा फटका पाणीपुरवठ्यालाही बसला आहे. बीड बायपास परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, डिझेल न मिळाल्याने अनेक टँकरच्या फेऱ्या विस्कळीत झाल्या. अफवांचा फटका आणि रोख व्यवहारांचा नियम राज ऑटो पेट्रोल पंपचे प्रमुख हेमंत खिंवसरा यांच्या मते, इंधनाचा तुटवडा नाही, तर अफवेमुळे लोक टाक्या फुल्ल करून घेत आहेत. तसेच पूर्वी तेल कंपन्या पंपचालकांना ५ दिवसांच्या क्रेडिटवर इंधन पुरवत असत, मात्र आता केवळ आगाऊ पैसे भरल्यावरच टँकर मिळत असल्याने काही पंपांवर तांत्रिक अडचण निर्माण होत आहे.
सोन्याचे दर 3,811 रुपयांनी,चांदी 9,270 रुपये महागली:सलग दुसऱ्या दिवशीही सराफा बाजारामध्ये तेजी
जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि मध्य पूर्वेतील इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम सुवर्ण बाजारावर दिसून आला आहे. बुधवारी वायदे बाजारात सोन्याच्या दरात तब्बल ३८११ रुपयांची वाढ होऊन भाव प्रति १० ग्रॅम १,५०,३८० लाख रुपये झाला, तर चांदीमध्ये तब्बल ९२७० रुपयांची वाढ झाली. सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीला पसंती दिली आहे. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सोने व चांदीच्या दरात तेजी दिसून आली. मंगळवारी १,४६,५६९ रुपये असणारे सोने बुधवारी १,५०,३८० रुपये झाले तर चांदी २,४१,०२० रुपयांवरून थेट २,५०,२९० रुपये प्रति किलो झाली. बाजारात सध्या तेजी असली तरी संस्थात्मक गुंतवणूकदार नफ्यासाठी विक्री करत आहेत. त्यामुळे या धातूत घसरण सुरू होती. परंतु व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केल्यामुळे दरवाढीला अधिक गती मिळाली आहे. नजीकच्या काळात सोन्याचे भाव उच्चांकी स्थिर राहू शकतात. जागतिक घडामोडींनुसार चढ-उतार अपेक्षित आहेत.
शहरवासीयांसाठी एलपीजीच्या तुलनेत पंधरा टक्के स्वस्त मिळणारा वायूस्वरूपातील पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस (पीएनजी) चार वर्षांनंतरही बहुतांश स्वयंपाकघरात पोहोचला नाही. पंच्याहत्तर हजार जोडण्यांची तयारी केली असताना प्रत्यक्षात केवळ दीड हजार घरांपर्यंत गॅसचा पुरवठा सुरू झाला आहे. वाळूज महानगर, बीड बायपाससह काही भागांत २० हजार जोडण्या कार्यान्वित झाल्या तरी नागरिकांमध्ये अनास्था दिसून येते. केवळ अकराशे रुपये भरून शेगडी चालू करता येते. एलपीजी एजन्सीसमोर तासन््तास रांगा लावण्यापेक्षा पीएनजीकडे वळताना नागरिक मागे हटत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराच्या वितरणाची जबाबदारी असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेडने (बीपीसीएल) आतापर्यंत ७५ हजार नागरिकांना कनेक्शन दिले आहे. शहरात किमान एक लाख कुटुंबांपर्यंत पीएनजी पोहोचवण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. जानेवारी २०२२ रोजी या योजनेचे भूमिपूजन झाले होते. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून शहरात भूमिगत पाइपलाइनद्वारे गॅस आणण्याच्या साडेतीन हजार कोटी रुपयांच्या मेगा प्रोजेक्टचा शुभारंभ केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते पार पडला. पहिल्या टप्प्यात २५ हजार कुटुंबांना जोडण्या देण्याचे ठरले होते. तरी आगामी २०२३ च्या दिवाळीपूर्वी एक लाख कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पीएनजी गॅसची वैशिष्ट्ये जितके वापराल तितकेच बिल येते – मीटरवर आकारणी. दोन महिन्यांतून एकदा बिल भरावे लागते. गॅस वायुरूपात असल्याने गळती झाल्यास तत्काळ हवेत विरघळतो. धोका राहत नाही. एलपीजीच्या तुलनेत १५ टक्के स्वस्त. सिलिंडर ऑर्डरचा त्रास नाही. विजेसारखा २४ तास उपलब्ध. केवळ १,१०० रुपयांमध्ये जोडणी सुरू पाइपलाइनची रचना अशी ईस्ट - वेस्ट कोस्ट जोडणारी मुख्य पाइपलाइन अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरसाठी श्रीगोंदा येथे टॅपिंग पॉइंट दिला आहे. पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून पीएनजी आणला जातो. सिटी गॅस डिस्ट्रिब्युशनद्वारे शहरात वितरण होते. दोन्ही जिल्ह्यांसाठी बीपीसीएल ही नोडल कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. घरात प्रत्यक्ष जीआय पाइपद्वारे गॅसपुरवठा केला जातो. व्यास ९० मिमी, ६० मिमी आणि ३२ मिमी असलेल्या पाइपलाइनमधून घरगुती पुरवठा होतो. ५०० रुपयांत नोंदणी, दोन महिन्यांनंतर बिल प्रत्येकी पाचशे रुपये नोंदणी शुल्क व सुरक्षा अनामत रक्कम भरावी लागते. याशिवाय इतर शुल्कात सवलत देण्यात आली आहे. दोन महिन्यांनंतर वापरलेल्या गॅसप्रमाणे बिल येते. घरांना जोडण्या दिल्या तेव्हा नागरिकांनी लेखी संमती दिली होती. आतापर्यंत किमान २० हजार घरांना गॅसपुरवठ्याची तरतूद झाली आहे. मात्र, केवळ दीड हजार ग्राहकांनी प्रत्यक्ष वापर सुरू केला आहे, असे बीपीसीएल अभियांत्रिकी विभागाचे सहायक प्रबंधक सचिन सोळुंके यांनी सांगितले. एलपीजीचे सिलिंडर जमा करण्याची भीती कारणीभूत पीएनजी कनेक्शन घेतल्यानंतर एलपीजी सिलिंडरही स्वतंत्र शेगडीवर वापरता येतात. मात्र एकदा पीएनजी घेतल्यास एलपीजी सिलिंडर जमा करावा लागेल, अशी खात्रीलायक भीती नागरिकांमध्ये आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमांनुसार पीएनजी असलेल्या घरांना अनुदानित एलपीजी मिळणार नाही. गॅस खंडित झाल्यास पर्याय म्हणून सिलिंडर मिळणार नाही, अशी शंका आहे.
महाराष्ट्रात महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच या प्रकरणांमागचे वस्तुस्थितिदर्शक विश्लेषण समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती सादर केली. गेल्या १३ वर्षांतील आकडेवारीचा दाखला देत त्यांनी स्पष्ट केले की, तांत्रिक भाषेत ज्याला आपण “अपहरण’ म्हणतो, त्याचे प्रमाण अवघे १.८६% इतके मर्यादित आहे. याउलट, बेपत्ता होणाऱ्या मुलींपैकी ५७% प्रकरणांमागे प्रेम प्रकरण हे मुख्य कारण असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. जानेवारी २०१२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यात एकूण १,३७,२११ मुले-मुली बेपत्ता झाली होती. यापैकी १,३१,७३७ जणांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले असून ते सुरक्षित घरी परतले आहेत. विशेषतः मुलींच्या बाबतीत बेपत्ता झालेल्या ९५,००० मुलींपैकी ९१,००० मुलींचा शोध लावण्यात आला आहे. महिलांच्या बाबतीत २०२५ पर्यंत हे शोधाचे प्रमाण ७५% असून दोन ते अडीच वर्षांच्या सायकलमध्ये हे प्रमाण ९२% पर्यंत पोहोचते. प्रेमप्रकरणे आणि कौटुंबिक वाद आहेत आघाडीवर प्रेमप्रकरणे : मुलींच्या बेपत्ता होण्यामागे हे सर्वात मोठे कारण असून याचे प्रमाण ५६.८६% आहे, तर महिलांमध्ये हे प्रमाण ३८% इतके असल्याचे समोर आले आहे.कौटुंबिक वाद : महिला बेपत्ता होण्यामागे कौटुंबिक वाद हे प्रमुख कारण (३७%) असून मुलींच्या बाबतीत हे प्रमाण २१.३८% आहे.मानसिक तणाव : मानसिक तणावामुळे बेपत्ता होण्याचे प्रमाण महिलांमध्ये ५.२९% तर मुलींमध्ये २.१२% आहे. पोलिस प्रशासनाचा ‘स्पेशल सेल’ आणि रँकिंग बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आता प्रत्येक पोलिस स्टेशनचे रँकिंग केले जात आहे. सर्वाधिक शोध लावणारे आणि सर्वात कमी कामगिरी करणाऱ्या पोलिस स्टेशनची दरमहा वर्गवारी केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांनुसार, बेपत्ता व्यक्ती सापडेपर्यंत त्याला “अपहरण’ या संज्ञेतच मोजावे लागते, ज्यामुळे हा आकडा मोठा दिसतो. मात्र, वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. लातूरसह पुण्यामध्ये दोन खासगी कौशल्य विद्यापीठे राज्यातील तरुणांना आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने लातूर आणि पुणे येथे दोन नवीन खासगी कौशल्य विद्यापीठांच्या स्थापनेसाठी “महाराष्ट्र खासगी कौशल्य विद्यापीठ (सुधारणा) विधेयक’ बुधवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे या विद्यापीठांमध्ये ग्रामीण भागातील तरुणांना प्राधान्य देण्यासाठी ६० टक्के जागा स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. या संस्थांना मिळाली मंजुरी? या विधेयकानुसार, लातूरमध्ये पाशा पटेल यांच्या फीनिक्स फाउंडेशनद्वारे संचालित ‘पाशा स्किल टेक युनिव्हर्सिटी’ आणि पुणे येथे फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जाइजिंग लाइव्ह्स संस्थेच्या ‘फ्युएल स्किल टेक आंत्रप्रेन्योरशिप युनिव्हर्सिटी’ला मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही संस्था स्वयंचलित तत्त्वावर कार्यरत राहतील.
राज्यातील सुमारे दीड ते दोन लाख गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी अधिकाराचा गैरवापर करून हडप करणाऱ्या महसूल विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर अखेर राज्य सरकारने बडगा उगारला आहे. या घोटाळ्यात सामील असलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना १५ दिवसांच्या ‘सक्तीच्या रजे’ ची शिक्षा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधान परिषदेत जाहीर केली. नाशिक विभागीय आयुक्तांचा सविस्तर अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही महसूल मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. आमदार अनिल परब यांनी १८ मार्च २०२६ रोजी लक्षवेधी सूचनेद्वारे हा गंभीर प्रकार सभागृहाच्या निदर्शनास आणला होता. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमताने शेतकऱ्यांच्या मालकी हक्कात परस्पर बदल केल्याचा आरोप त्यांनी केला होता. अहवालानंतर बडतर्फीची टांगती तलवार येणार या प्रकरणांचे अ, ब आणि क अशा तीन गटांत वर्गीकरण केले आहे. ‘अ’ गटातील १३ प्रकरणे अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, यात सामील असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत आहे. नाशिक विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार त्यांच्यावर पुढील फौजदारी किंवा प्रशासकीय कारवाई निश्चित होईल.
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटावर कब्जा घेण्याच्या मोहीमेत शरद पवारांचे नातू रोहित पवार पुन्हा सक्रिय झाले आहेत. सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्राचा संदर्भ देत त्यांनी नवा आरोप केला आहे. पत्रात म्हटले होते की, २८ जानेवारी २०२६ नंतरचा कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये. रोहित यांचे म्हणणे आहे की, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरेंनी पक्षावर कब्जा घेऊ नये म्हणून सुनेत्रा काकींनी ते पत्र दिले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना तटकरे म्हणाले की, रोहित यांनी कट कारस्थाने थांबवावीत. अन्यथा आम्हाला तोंड उघडावे लागेल. रोहित म्हणाले की, पक्ष ताब्यात आला की, दिल्लीतील भाजप नेत्यांशी स्वतःच्या सोयीनुसार चर्चा करणे आणि ईडीसारख्या कारवायांपासून स्वतःचा बचाव करणे, असा त्यांचा ‘गेम’ होता. म्हणून काकींनी पक्षाची सूत्रे स्वतःच्या हातात घेऊन या नेत्यांना बाजूला सारले आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. तटकरेंत माझे नाव घेऊन बोलण्याची हिंमत नाही, म्हणूनच ते हवेत गोळ्या मारत आहेत. त्यावर तटकरेंनी सांगितले की, तटकरे म्हणाले की, अजित पवारांच्या निधनानंतर पक्ष हायजॅक करण्याचे आणि विलीनीकरणाचे जे मनसुबे आखले गेले, ते आम्ही यशस्वी होऊ दिले नाहीत. दादांच्या अपघातापासून ते पोस्टमार्टमपर्यंत नक्की काय काय घडलं, याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे आता तरी ही कटकारस्थानं थांबवा, अन्यथा मला अनेक बाबी जाहीरपणे स्पष्ट कराव्या लागतील. रोहित यांनी प्रचंड खर्च करून काढलेला त्यांचा महाराष्ट्र दौरा पूर्णपणे ‘फ्लॉप शो’ ठरला आहे. हा वाद सुरू राहणार आहे गेल्या पावणेदोन महिन्यात रोहित पवार सातत्याने पटेल, तटकरेंवर आरोप करत आहेत. त्यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या मदतीने एफआयआरही दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा होईपर्यंत वाद सुरूच राहिल. आणि येत्या काही महिन्यात अशी चर्चा होण्याची शक्यता कमी आहे, असा जाणकारांचा अंदाज आहे.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन:इतिहास संशोधनातील ऋषीचुल्य व्यक्तिमत्व हरपले
शिवकालीन आणि मराठा इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर फुफ्फुसाच्या संसर्गामुळे उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि मुली असा परिवार आहे. सांगली जिल्ह्यातील 'तडसर' हे डॉ. पवार यांचे मूळ गाव. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जयसिंगरावांच्या शिक्षणाची दिशा राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथे बदलली. प्रारंभी अर्थशास्त्र विषयात रस नसतानाही त्यांनी नंतर इतिहासाची वाट धरली आणि शिवाजी विद्यापीठातून एम.ए. परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या वसतिगृहांमुळेच आपण शिकू शकलो, ही कृतज्ञतेची भावना त्यांच्या मनात कायम होती. 'पंचगंगा तिरी' या त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांचा हा जीवनप्रवास उलगडला आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई आणि महाराणी येसूबाई यांच्या जीवनावरील अनेक अज्ञात साधने त्यांनी प्रकाशात आणली. करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांचे चरित्र लेखून त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची जगाला ओळख करून दिली. तसेच, दादोजी कोंडदेव यांच्या संदर्भातील त्यांची ऐतिहासिक मांडणी ही संशोधक म्हणून त्यांची विशेष ओळख ठरली. पवारांना हे मिळाले पुरस्कार आयुष्यभर शाहू विचारांनी झपाटलेल्या डॉ. पवार यांना त्यांच्या कार्यासाठी 21 हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्तेही त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता.
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान देशात इंधनटंचाई होणार असल्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी होत असून मोठ्या रांगा लागत आहेत. छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, कोल्हापूर, जालना, नाशिक, पुण्यासह विविध शहरात हेच चित्र दिसत आहे, ज्यामुळे मागणी व पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेत कोल्हापुरात दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त २०० रुपयांपर्यंत आणि तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त २००० रुपयांपर्यंतच इंधन भरता येईल, असे निर्देश कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.हा निर्णय ३१ मार्चपर्यंत असणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात ‘वाहनधारकांना इंधन भरण्यासंबंधित संयमाचे आवाहनही करण्यात आले आहे. अफवांना बळी पडून वाहनांत जास्तीचे इंधन भरू नका : प्रशासन छत्रपती संभाजीनगरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशात तसेच आपल्या शहरातही इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलची कमतरता नाही. पेट्रोल पंपांना पुरवठा करणाऱ्या टर्मिनल्सवरही पुरेसा साठा उपलब्ध आहे. तरीही काहीजण केवळ अफवांना बळी पडून साठा करण्याच्या प्रयत्नात आहेत. वाहनांमध्ये जास्तीचे इंधन भरू नये, असे आवाहन केले. गरजेपेक्षा जास्त इंधन भरणा, पंपांवर लोड इंधनटंचाईच्या धास्तीने वाहनधारक गरजेपेक्षा जास्त इंधन भरत आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपांवरही याचा अधिकचा भार पडत आहे. अनेक ठिकाणी खासगी किंवा लहान पेट्रोल पंपांचा इंधनसाठा तर अशा गर्दीमुळे वेळेआधीच संपत आहे. त्यामुळेही पंपचालक आणि वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
महाराष्ट्र विधानसभेने बुधवारी भारतीय न्याय संहिता विधेयक २०२६ एकमताने मंजूर केले. या विधेयकाद्वारे शक्ती विधेयकात अशा तरतुदींचा समावेश केला जाईल. त्यामुळे ॲसिड हल्ल्यातील पीडितांची ओळख संरक्षित केली जाईल आणि डिजिटल लैंगिक छेडछाडीसाठी तुरुंगवासाची तरतूद सुनिश्चित केली जाईल. शक्ती विधेयक २०२० मध्ये राज्य विधानमंडळाने मंजूर करून राष्ट्रपतींच्या संमतीसाठी केंद्राकडे पाठवले होते. तेव्हा भारतीय दंड संहिता (आयपीसी), फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी), लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यातील तरतुदी एकत्र करून केंद्र असा एक कायदा करत असल्याची माहिती राज्याला दिली होती. राष्ट्रपतींनी ते विधेयक परत पाठवले होते. राज्यासंदर्भात भारतीय न्याय संहितेत सुधारणांची आवश्यकता आहे का, समिती स्थापन केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या विधेयकात तीन वर्ष शिक्षेसह दंड प्रस्तावित गुन्ह्याची व्याप्ती : पूर्वी केवळ शारीरिक छळ किंवा प्रत्यक्ष विनयभंगावर लक्ष केंद्रित होते, मात्र आता टेलिफोन, ईमेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मानसिक आणि डिजिटल छळालाही ‘लैंगिक छळ’ विनयभंग श्रेणीत आणून त्याचे गांभीर्य वाढले आहे. विधेयक २०२६ मध्ये तीन वर्षे शिक्षेसह दंड प्रस्तावित आहेत.
मुंढवा जमीन घोटाळा:खासदार पार्थ पवारांना क्लीन चिट!, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी चौकशी अहवाल
पुण्याजवळील मुंढवा येथील १८८० कोटींची सरकारी जमीन ३०० कोटी रुपयांत खरेदी प्रकरणात खासदार पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या जमिनीच्या मालकी हक्कामध्ये खरेदीदारांच्या नावाची नोंद नाही. ताबाही हस्तांतरण झाला नाही. या जमिनीचा मालकी हक्क शासनाचा आहे, असे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल सरकारला प्राप्त झाला असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सभागृहात विधिमंडळाच्या पटलावर ठेवला. महसूल विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अहवालातील मुख्य निष्कर्ष१. पार्थ यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा एकही पुरावा आढळलेला नाही. २. तक्रारदारांचे दावे केवळ ऐकीव माहितीवर आधारित असून, त्याबाबत कोणतेही ठोस तांत्रिक किंवा कायदेशीर दस्तऐवज सादर करता आले नाहीत. चौकशी समितीसमोर १४ प्रत्यक्ष सुनावण्या झाल्या. लेखी म्हणणे पक्षकार व साक्षीदार २७ होते. तपासलेले तांत्रिक दस्तऐवज १५० पेक्षा जास्त आहेत. अहवाल ४३९२ पानांचा आहे.
अजित पवारांच्या अपघातप्रकरणी कर्नाटक सरकारने दाखल केलेला झीरो एफआयआर पूर्णपणे बेकायदेशीर असून ही केवळ महाराष्ट्राची मानहानी करण्यासाठी केलेली खेळी आहे,” अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. या प्रकरणाचा तपास नियमानुसार महाराष्ट्रातच होईल. अजित पवारांचा कुणी घातपात केला असेल तर त्याला खणून काढू, असेही ते म्हणाले. रोहित पवारांनी केलेल्या अनेक आरोपांवर तपासातून काय निष्पन्न झाले, याची माहिती त्यांनी दिली. विधानसभेत फडणवीस म्हणाले की, अपघातानंतर एडीआर दाखल होतो आणि चौकशीनंतर त्याचे रूपांतर एफआयआरमध्ये होते. ही कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र, कर्नाटकने हस्तक्षेप करून झीरो एफआयआर दाखल केला. जो मुळात त्यांच्या अधिकारक्षेत्रात येतच नाही. जेव्हा पीडित व्यक्ती संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोहोचण्याच्या परिस्थितीत नसते, तेव्हाच झीरो एफआयआर दाखल होतो. या प्रकरणात तशी कोणतीही स्थिती नव्हती. रोहित यांच्या आरोपांना अप्रत्यक्षपणे खोडले रोहित पवारांचा एक आरोप असा होता की, वैमानिक बदलामागे काहीतरी कट होता. मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकातील एफआयआरच्या निमित्ताने तो खोडला. ते म्हणाले की, २७ जानेवारी रोजी कॅप्टन राहुल ओबेरॉय, दिलीप सिंह यांची नियुक्ती होती. मात्र, ओबेरॉय यांचे पोट खराब असल्याने रात्री ११:५४ वाजता सुमीत कपूर, शांभवी पाठक यांची नियुक्ती झाली. व्हिसेरा आणि रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल, अमली पदार्थ किंवा कोणत्याही विषाचा अंश आढळलेला नाही. विमानाच्या राखेत स्फोटकांचे अंशही मिळालेले नाहीत. विमानाची शेवटची तपासणी २३ मार्च २०२५ रोजी झाली होती. सीबीआय चौकशीसाठी अमित शाह यांना भेटणार अजित पवार अपघात प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन अमित शाह यांची भेट घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी धर्मांतरितांसंबंधीचा महत्त्वाचा निर्णय दिला. हिंदू, शीख आणि बौद्ध धर्माशी संबंधित व्यक्तींनाच अनुसूचित जातीचा दर्जा मिळू शकतो असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. जर कोणी ख्रिश्चन किंवा अन्य कोणत्या धर्मात धर्मांतर केले तर त्या व्यक्तीचा अनुसूचित जातीचा दर्जा रद्द होईल असा निर्णय न्या. पी. के. मिश्रा आणि न्या. एम. व्ही. अंजारिया यांच्या […] The post …तर ‘एससी’दर्जा रद्द! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तंत्रज्ञान माहिती देईल; पण अनुभवाचे बोल फक्त शिक्षकच देऊ शकतात
लातूर : प्रतिनिधी तंत्रज्ञान आणि मानवी अनुभव यातील फरक अधोरेखित केला आहे. एक मिनिटाच्या रिल्समध्ये शिक्षण आणि माहिती देणा-या अनेक लिंक येतात. चॅट जीपीटी विचारलेली माहिती नक्कीच देते, पण अनुभवाचे बोल, जगाशी लढण्यासाठी लागणारी ताकद फक्त शिक्षकच देऊ शकतात. जबाबदारीचा भार कमी करण्याचे काम शिक्षकांमुळे शक्य होऊ शकते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांनी […] The post तंत्रज्ञान माहिती देईल; पण अनुभवाचे बोल फक्त शिक्षकच देऊ शकतात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रामेश्वर येथे प्रभू श्रीराम जन्मसोहळा
लातूर : प्रतिनिधी भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान, त्याग आणि समर्पणाचे मूर्तीमंत प्रतीक, समस्त भारतीयांचे श्रध्दास्थान असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्मसोहळ्याच्या निमित्ताने सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले भारतीय संस्कृती दर्शन ‘श्रीराम’ रथ यात्रा उत्सव आणि ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगावकर यांचा कीर्तन सोहळा लातूर तालुक्यातील रामेश्वर (रूई) येथे २६ मार्च गुरुवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास […] The post रामेश्वर येथे प्रभू श्रीराम जन्मसोहळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नरेंद्र गिरवलकर यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान
लातूर : प्रतिनिधी तुळजापूर-लिंगायत महासंघाच्या धाराशिव शाखेच्या वतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. २२ मार्च रोजी तुळजापूर येथे पार पडलेल्या लिंगायत समाज अधिवेशनामध्ये भातांगळी ता.जि. लातुरचे सुपुत्र लालबहादूर शास्त्री माध्यमिक वचन माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा प्राचार्य नरेंद्र सोमनाथ आप्पा गिरवलकर यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा […] The post नरेंद्र गिरवलकर यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सत्ताधा-यांनी लोकशाही मूल्ये धाब्यावर बसविली
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर विरोधकांची टीका मुंबई : प्रतिनिधी विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावांना कमी महत्त्व द्यायचे. दोन-तीन आठवडे विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची नाहीत. महत्त्वाची विधेयके शेवटच्या दिवशी मांडायची. विरोधकांना बोलू द्यायचे नाही. अनेक विषयांना बगल देऊन कामकाज पुढे रेटायचे, अशा अनेक अनिष्ट प्रथा सुरू झाल्या आहेत. लोकशाही मूल्ये धाब्यावर बसवण्याचे काम सरकारने सुरू केले आहे, अशी टीका राष्ट्रवादी […] The post सत्ताधा-यांनी लोकशाही मूल्ये धाब्यावर बसविली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विषय समित्यांवर कोणाला संधी मिळणार?
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा विषय मार्गी लागल्या नंतर विषय समित्या निवडीचा विषय एैरणीवर आला आहे. सोमवार दि. ३० मार्च रोजी विषय समिती सभापतींची निवड प्रक्रीया पार पडणार आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जि. प. सत्तेचा ५०-५० टक्के वाटा असल्याने कोणाला किती समित्या मिळणार याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. […] The post विषय समित्यांवर कोणाला संधी मिळणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिधापत्रिकाधारकांना मिळणार रॉकेल
जळकोट : ओमकार सोनटक्के सध्या अमेरिका, इझ्राईल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे डिझेल पेट्रोल, एलपीजी, सीएनजी, याची कमतरता निर्माण झाली आहे. यासोबतच आता घरगुती गॅसचा तुटवडाही निर्माण झाला आहे. गॅस बुकिंग करूनही ग्राहकांना गॅस मिळेनासा झाला आहे. नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. नागरिकांना गॅसला पर्याय व्यवस्था म्हणून आता सरकारने शिधापत्रिकाधारकांना (राशन कार्ड)रॉकेल […] The post शिधापत्रिकाधारकांना मिळणार रॉकेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सार्वजनिक कार्यक्रमामध्ये वंदे मातरमची सक्ती नाही
गृह मंत्रालयाच्या परिपत्रकाविरुद्धची याचिका फेटाळली नवी दिल्ली : वृत्तसंस्था सुप्रीम कोर्टाने बुधवारी राष्ट्रीय गीत वंदे मातरम गाण्याबाबत गृह मंत्रालयाच्या परिपत्रकाविरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळली. न्यायालयाने म्हटले की, सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी जारी केलेले हे निर्देश बंधनकारक नाहीत. परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका वेळेपूर्वीच दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि […] The post सार्वजनिक कार्यक्रमामध्ये वंदे मातरमची सक्ती नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाविद्यालयांतून संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी
किनगाव : वार्ताहर आजचा युवक हा विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संस्कारक्षम मूल्यांपासून दूरवला जात आहे ही बाब अतिशय चिंताजनक असून महाराष्ट्राच्या विविध महाविद्यालयातून संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी, असे प्रतिपादन सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी केले. किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत ग्रंथालय व विज्ञान प्रयोगशाळा ज्ञान-विज्ञान नूतन […] The post महाविद्यालयांतून संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन खरेदी प्रकरणाचा तपास करणाऱ्या विकास खारगे समितीचा तब्बल ४ हजार ३९२ पानांचा सविस्तर अहवाल अखेर विधिमंडळात सादर करण्यात आला आहे. या अहवालाने महसूल आणि नोंदणी विभागात मोठी खळबळ उडवून दिली असून, अनेक बड्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या अहवालात कोणालाही स्पष्टपणे 'क्लीन चिट' देण्यात आलेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावाचा थेट उल्लेख नसला, तरी भविष्यातील पोलीस तपासात त्यांच्यावरील कारवाईची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांच्यावर 'टांगती तलवार' कायम असल्याचे मानले जात आहे. खारगे समितीने या घोटाळ्याचा सखोल अभ्यास करून जबाबदार अधिकाऱ्यांच्या बडतर्फीची शिफारस केली आहे. यामध्ये रवींद्र तारु (सहायक दुय्यम निबंधक) आणि सूर्यकांत येवले (तहसीलदार) यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. शीतल तेजवानी आणि अशोक गायकवाड यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पार्थ पवार यांचे मावस भाऊ दिग्विजय पाटील यांना 'अमेडिया कंपनी' प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. अहवालातील निष्कर्ष काय? खारगे समितीने एकूण ७ बैठका घेऊन आणि तीन वेळा मुदतवाढ घेऊन हा सविस्तर अहवाल तयार केला आहे. अहवालातील काही धक्कादायक निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत. पार्थ पवारांबाबत सस्पेन्स कायम राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या पार्थ पवार यांच्या भूमिकेबाबत समितीने सावध पवित्रा घेतला आहे. अहवालात त्यांच्या नावाचा थेट कारवाईसाठी उल्लेख नाही. मात्र, भविष्यातील फौजदारी तपासात जर अधिक लोकांचा सहभाग किंवा पुरावे आढळले, तर त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते, असे समितीने नमूद केल्याने हा विषय अद्याप संपलेला नाही, हे स्पष्ट होते. फौजदारी चौकशीतून नवे खुलासे होणार? समितीचे कार्यक्षेत्र केवळ प्रशासकीय अनियमिततेपुरते मर्यादित होते, त्यामुळे त्यांनी फौजदारी स्वरूपाचा सखोल तपास केलेला नाही. मात्र, आता हा अहवाल पटलावर आल्यानंतर पोलीस तपासाला गती मिळणार असून, येत्या काळात महसूल विभागातील आणखी काही 'बड्या माशांचे' नाव या घोटाळ्यात समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तिवसा तालुक्यातील गुरुदेव नगर येथे संताजी जगनाडे महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी तेली समाज आग्रही झाला आहे. संत परंपरेचा वारसा जपण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी हा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी ग्रामपंचायतीला पत्र देण्यात आले असून, विविध कंपन्यांकडून सीएसआर निधी मिळवून देण्याची विनंती करण्यात आली आहे. गुरुदेव नगरचे उपसरपंच मिलिंद काळमेघ यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले. गावातील संत परंपरा, भक्तीभाव आणि सामाजिक एकात्मता जपण्यासाठी पुतळा उभारणे आवश्यक असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. या उपक्रमातून भावी पिढीला संतांच्या विचारांची प्रेरणा मिळेल आणि सामाजिक मूल्यांची जपणूक होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या पुतळा उभारणीसाठी अंदाजे ५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून भागविण्याची विनंती करण्यात आली आहे. याशिवाय, पुतळ्यासाठी योग्य सार्वजनिक जागा निश्चित करून आवश्यक प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात यावी, अशी मागणीही तेली समाजाने केली आहे. यावेळी नामदेव मुंगले, धनराज बारबुद्धे, जयंत निखाडे, सूरज देवतारे, योगेश भिल, विनोद मुंगले, मंगेश तांबूलकर, नितीन निखाडे यांच्यासह तेली समाजाचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. हर्षवर्धन देशमुख यांनी प्रतिपादन केले की, देशाची लोकशाही सक्षम करण्यासाठी ग्रामसभा प्रभावी असणे अत्यंत आवश्यक आहे. गावातील प्रत्येक नागरिकाला ग्रामसभेचे महत्त्व समजेपर्यंत खऱ्या अर्थाने ग्रामीण विकास साधला जाणार नाही. ते 'संत गाडगेबाबांची दशसूत्रे आणि ग्रामविकास' या विषयावर आयोजित सरपंच कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरूजी होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विद्या शर्मा, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश तराळ, महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना संस्थापक अध्यक्ष गजानन बोंडे, महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना अध्यक्ष राजेंद्र कराळे आणि संत गाडगे बाबा अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे उपस्थित होते. डॉ. देशमुख यांनी पुढे सांगितले की, सरपंचांनी अधिकारांसोबत जबाबदारीची जाणीव ठेवून काम केले पाहिजे. ग्रामपंचायतीमध्ये होणारे सर्व व्यवहार आणि खर्च गावातील प्रत्येक नागरिकाला समजले पाहिजेत. यामुळे प्रशासनात पारदर्शकता येईल. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश तराळ म्हणाले की, संत गाडगे बाबांनी समाजाला दिलेली दशसूत्री केवळ आध्यात्मिक उपदेश नसून, तो ग्रामविकासाचा एक परिपूर्ण कृती आराखडा आहे. विज्ञानाची जोड देऊन या दशसूत्रीची अंमलबजावणी केल्यास गावे खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होतील. दशसूत्रीतील प्रत्येक सूत्राचा आधुनिक ग्रामविकासाशी संबंध आहे. डॉ. तराळ यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. बाबांनी रंजल्या-गांजल्यांसाठी शाळा आणि वसतिगृहे उभारली, कारण विचारांचे परिवर्तन शिक्षणाशिवाय शक्य नाही हे त्यांना माहीत होते. केवळ परिसर स्वच्छ ठेवणे म्हणजे स्वच्छता नव्हे, तर विचारांची स्वच्छता राखणे हे ग्रामविकासाचे पहिले पाऊल आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला खिळखिळी करणाऱ्या व्यसनाधीनतेवर प्रहार करत, सरपंचांना आपल्या गावातून व्यसनमुक्तीची चळवळ सुरू करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात आचार्य वेरूळकर गुरूजी म्हणाले की, संत गाडगे बाबांनी दिलेली दशसूत्री हा केवळ उपदेश नसून, तो गाव सुखी आणि समृद्ध करण्याचा एक कृती आराखडा आहे. जोपर्यंत गावातील शेवटच्या माणसापर्यंत या दशसूत्रीचा लाभ पोहोचत नाही, तोपर्यंत ग्रामविकास अपूर्ण आहे. गाडगे बाबांनी हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा मंत्र दिला, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून ग्रामविकासाची संकल्पना मांडली. कार्यशाळेचे संचालन डॉ. राजेश मिरगे यांनी केले. या कार्यशाळेला विदर्भातील सरपंच तसेच विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात ग्रामपंचायतीमध्ये नियुक्त झालेल्या प्रशासकाची जबाबदारी व भूमिका यावर लीनाताई तुरकर यांनी माहिती दिली, तर शासकीय योजना राबवताना येणाऱ्या अडचणींवर प्रा. राजेंद्र कराळे यांनी मार्गदर्शन केले.
अमरावती जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इंधन तुटवड्याच्या भीतीमुळे नागरिक धास्तावले असून, वाहनांची टाकी पूर्ण भरण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. या गर्दीमुळे तिवसा येथील तीन आणि अमरावती शहरातील एक असे एकूण चार पेट्रोल पंप बंद पडले आहेत. अमेरिका-इराण युद्ध लांबल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मंगळवारी दुपारी संसदेत केंद्र सरकारने युद्धाची सद्यस्थिती मांडली. यावेळी नजीकच्या भविष्यात भारतावर संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने, नागरिकांनी लगेच पेट्रोल पंपांकडे धाव घेतली. मंगळवार सायंकाळपासूनच शहर आणि जिल्ह्यातील पंपांवर ग्राहकांची गर्दी वाढली. एका पेट्रोल पंप चालकाच्या मते, प्रत्येक पंपावर त्यांच्या साठवण क्षमतेनुसार चार ते पाच दिवस पुरेल इतका साठा असतो. मात्र, इतक्या दिवसांत येणारे ग्राहक एकाच दिवशी पोहोचल्याने काही पंपांवरील साठा संपला. तिवसा आणि वलगाव रोडवरील पंप बंद पडणे हे त्याचेच परिणाम आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम, रिलायन्स आणि नायरा या पाच कंपन्या इंधन विक्री करतात. भारत पेट्रोलियमकडे ४०० किलोलीटर पेट्रोल आणि ४५० किलोलीटर डिझेल, हिंदुस्थान पेट्रोलियमकडे ३२० किलोलीटर पेट्रोल आणि २८४ किलोलीटर डिझेल, तर इंडियन ऑइलकडे ५०० किलोलीटर पेट्रोल आणि ५५० किलोलीटर डिझेल उपलब्ध आहे. याशिवाय, नायराकडे ३८५ किलोलीटर पेट्रोल आणि २७५ किलोलीटर डिझेलचा साठा आहे. ५५३ किलोलीटर पेट्रोल आणि ७४२ किलोलीटर डिझेल अमरावतीच्या मार्गावर असून, त्याचा पुरवठा वेळेत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. आवश्यक असलेला इंधनाचा पुरवठा नियमितपणे केला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात एकूण २०९ पेट्रोल-डिझेल पंप आहेत. यामध्ये बीपीसीएलचे ६१, आयओसीएलचे ५५, एचपीसीएलचे ५३, नायराचे ३३ आणि रिलायन्सचे ७ पंप आहेत. या सर्व पंपांवर त्यांच्या साठवण क्षमतेनुसार किमान आठवडाभर पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नागरिकांना अनावश्यक साठेबाजी टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, इंधनाची साठवणूक करण्यात येऊ नये. आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे, यामुळे सर्वांना इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळेल. इंधन कंपन्यांनी ग्राहकांच्या सोयीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. भारत पेट्रोलियमसाठी रवी चव्हाण (८८७९६५६५८२), हिंदुस्थान पेट्रोलियमसाठी अंकित पटेल (९५८९२५७२६०), इंडियन ऑइलसाठी विलास डिग्रसे (९४२३५८५४११) आणि नायरासाठी आकाश मिश्रा (८५३०७५८३६९) यांच्याशी संपर्क साधता येईल.
तिवसा तालुक्यात इंधनाचा तुटवडा:तीन पेट्रोल पंप बंद, हायवेवरील पंपांवर डिझेलसाठी ट्रकच्या रांगा
तिवसा तालुक्यात इंधनाच्या तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. आज, बुधवारी तिवसानजीकच्या राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोलपंपांवर डिझेलसाठी ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसले. या तुटवड्यामुळे तालुक्यातील तीन ते चार पेट्रोलपंप बंद पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी याच तालुक्यात अनेक पेट्रोलपंपांवर पेट्रोल-डिझेलसाठी दुचाकींच्या रांगा लागल्या होत्या. आता डिझेलच्या तुटवड्यामुळे अमरावती-नागपूर महामार्गावरून ये-जा करणाऱ्या मोठ्या वाहनांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. गुरुकुंज मोझरी जवळील राष्ट्रसंत पेट्रोलियमसारख्या पंपांवर सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सध्याच्या जागतिक घडामोडींमुळे, विशेषतः अमेरिका-इराणमधील तणावामुळे, तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याची चर्चा आहे. याचा परिणाम म्हणून स्थानिक पातळीवर इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. अनेक पंपांवर साठा संपुष्टात आल्याने ते बंद ठेवण्यात आले आहेत. ग्राहकांना गरजेनुसार पेट्रोल-डिझेल उपलब्ध व्हावे यासाठी पेट्रोलपंपधारक स्वतः उपस्थित राहून परिस्थिती हाताळत असल्याचे दिसून येत आहे.
वरुडमध्ये इंधनासाठी नागरिकांची गर्दी:तुटवड्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपावर पोलिस बंदोबस्तात विक्री
वरुड शहरात इंधनाच्या तुटवड्याच्या अफवेमुळे मंगळवारी रात्रीपासून पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे काही पेट्रोल पंपांवर दुचाकी, तीनचाकी वाहनांसह ट्रकची गर्दी वाढली आहे. या परिस्थितीमुळे येथील यावलकर पेट्रोल पंपावर इंधन विक्रीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या निगराणीखाली इंधनाची विक्री सुरू आहे. दरम्यान, वरुड व्यापारी संघ आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (CAIT) स्थानिक शाखेचे अध्यक्ष गिरिधर देशमुख, उपाध्यक्ष रमेश हुकुम आणि कोषाध्यक्ष जगदीश उपाध्याय यांनी यावलकर पेट्रोल पंपाला भेट दिली. त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते, तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी साठेबाजी न करता, गरजेनुसारच इंधन खरेदी करावी. यावेळी नायब तहसीलदार पंकज चव्हाण आणि पेट्रोल पंपचालक निळकंठ यावलकर हे देखील उपस्थित होते. वरुडचे तहसीलदार रामदास शेळके यांनीही नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, वरुडमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे. तसेच, पेट्रोल पंप चालकांना वाहनांशिवाय कोणालाही कॅनमध्ये पेट्रोल किंवा डिझेल न देण्याचे निर्देश दिले आहेत.
अमरावती: पंधरा दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडर रिफिल न झाल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज, बुधवारी रिकाम्या सिलिंडरसह थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. काही नागरिकांना सिलिंडर वितरित झाल्याचे संदेश प्राप्त झाले असले तरी, प्रत्यक्षात त्यांना सिलिंडर मिळाले नव्हते, यामुळे त्यांचा संताप वाढला होता. हे ग्राहक रुक्मिणीनगर भागातील लक्ष्मी गॅस एजन्सीशी संबंधित आहेत. गॅसच्या तुटवड्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता, या एजन्सीचे शटर गेल्या दोन दिवसांपासून बंद होते. १० मार्च रोजी ज्या ग्राहकांनी रिफिलिंगसाठी नोंदणी केली होती, त्यांना अद्यापही सिलिंडर मिळालेले नाहीत. याउलट, काही जणांच्या मोबाईलवर सिलिंडर वितरित झाल्याचे चुकीचे संदेश आले होते. या प्रकारामुळे धास्तावलेल्या ग्राहकांनी सुरुवातीला लक्ष्मी गॅस एजन्सीचे कार्यालय गाठले, परंतु त्यांना तेथे कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी आपली कैफियत मांडण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवला. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) ज्ञानेश घ्यार आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर आपली समस्या मांडली. सिलिंडर वितरित झाल्याच्या संदेशाची पडताळणी केली असता, तो चुकीचा संदेश असल्याचे अधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितले. यावेळी नागरिकांनी तातडीने सिलिंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी येत्या एक-दोन दिवसांत हा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी योगेश बांबल, प्रवीण बनसोड, डॉ. सुनील पोटफोडे, शंकर सहारे, हरिश सोनकांबले, डॉ. सुधीर कोसरे, संतोष बनकर, प्रवीण डहाके, अभीजित ठवळी आदी उपस्थित होते. प्रभारी आरडीसी ज्ञानेश घ्यार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तात्काळ एक पथक लक्ष्मी गॅस एजन्सीकडे पाठवले. या पथकाने एजन्सीशी संपर्क साधून त्यांना कार्यालय उघडण्यास भाग पाडले आणि गोदामातील साठ्याची तपासणी केली. एजन्सीकडे सिलिंडर उपलब्ध नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले. १० मार्च रोजी बुकिंग केलेल्या ग्राहकांना येत्या एक-दोन दिवसांत सिलिंडर मिळवून देऊ, असे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. लवकरच साठा उपलब्ध होणार असल्याने ही व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
अमरावतीत दुचाकी चोरट्याला अटक:पीडीएमसी गेटजवळून चोरलेली दुचाकी जप्त, गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती येथे गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. मोहम्मद सुफीयान युसूफअली शाह (२४, रा. साबनपुरा, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पीडीएमसीच्या गेटजवळून चोरलेली एक दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई बुधवार, २५ मार्च रोजी करण्यात आली. गुन्हे शाखेचे पथक गाडगेनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या एका गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान, एक तरुण चोरीची दुचाकी विकण्याच्या उद्देशाने मध्यवर्ती बसस्थानकाकडून सुंदरलाल चौकाकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणासमोर आरोपीला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपी मोहम्मद सुफीयान याने ही दुचाकी काही दिवसांपूर्वी गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयाच्या (पीडीएमसी) गेटजवळून चोरल्याची कबुली दिली. जप्त करण्यात आलेल्या दुचाकीचा क्रमांक एमएच २७ एक्यू ९०५२ असा आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी मोहम्मद सुफीयान याला जप्त दुचाकीसह गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल कडू, संभाजी केंद्रे, गजानन ढेवले, विकास गुडधे, नाझीमोद्दीन सय्यद, सागर ठाकरे, निखिल गेडाम आणि योगेश पवार यांनी केली.
अमरावती येथील नागपुरी गेट पोलिसांनी दोन अट्टल घरफोड्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एका गुन्ह्याची उकल झाली असून, ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद जावेद शेख नईम (१९, रा. अबुबकर कॉलनी) आणि आदील खान अकील खान (१८, रा. अलीमनगर) अशी आहेत. ताजनगर क्रमांक २ मधील एका महिलेचे घर फोडून ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरण्यात आला होता. या प्रकरणी, महिलेच्या तक्रारीवरून २३ मार्च रोजी नागपुरी गेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या तपासामध्ये मोहम्मद जावेद आणि आदील खान यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
750 नृत्यांगना 'वंदे मातरम्'ला देणार मानवंदना:कोथरुडमध्ये रंगणार शास्त्रीय नृत्याचा भव्य महोत्सव
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांसाठी मंत्र ठरलेल्या 'वंदे मातरम्' या गीताच्या निर्मितीला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधून पुण्याच्या कोथरुड परिसरात एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात ७५० हून अधिक शास्त्रीय नृत्यांगना एकत्रितपणे 'वंदे मातरम्' गीतावर नृत्य सादर करून त्याला अनोखी मानवंदना देणार आहेत. प्रख्यात नृत्यगुरू रोहिणी भाटे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी कोथरुडमध्ये शास्त्रीय नृत्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा या महोत्सवाचे चौथे वर्ष असून, २८ आणि २९ मार्च रोजी कोथरुडमधील 'शुभारंभ लॉन्स' येथे हा सोहळा पार पडेल. महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग, युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवाचे संयोजन नगरसेवक पुनीत जोशी आणि अजय धोंगडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे, ख्यातनाम नृत्यगुरू शमा भाटे, मनीषा साठे आणि सुचेता चापेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ७५० हून अधिक नृत्यांगना एकाच वेळी मंचावर आपली कला सादर करतील. या नयनरम्य सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माधुरीताई मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यंदाचे वर्ष 'वंदे मातरम्'च्या दीडशे वर्षांच्या प्रवासाला समर्पित असल्याने, हा महोत्सव केवळ एक कार्यक्रम न राहता तो राष्ट्रभक्ती आणि कलेचा एक सुंदर संगम ठरणार आहे. यापूर्वीच्या तीन पर्वांमध्ये रमा वैद्यनाथन, वस्वती मिश्रा आणि प्रीती पटेल यांसारख्या जागतिक कीर्तीच्या कलाकारांनी आपल्या नृत्याने पुणेकरांना मंत्रमुग्ध केले होते. संयोजक पुनीत जोशी आणि अजय धोंगडे यांनी पुणेकरांना या सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून भारतीय संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचेल.
ज्येष्ठ मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी कोथरूड येथील परमहंस नगर येथे आयोजित 'हिंदू संमेलना'त आपले मत व्यक्त केले. स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटूनही भारतात हिंदूंनाच आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो, ही शोकांतिका असल्याचे ते म्हणाले. हिंदू समाजाने संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी जागे होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पोंक्षे म्हणाले की, भारतावर झालेल्या सततच्या आक्रमणांमुळे हिंदूंमध्ये न्यूनगंड निर्माण झाला. ब्रिटिशांनी हिंदूंना त्यांच्या इतिहासापासून, संस्कृतीपासून आणि भाषेपासून तोडले, इंग्रजी लादली. यामुळे हिंदूंना स्वतःच्या संस्कृतीची आणि धर्माची लाज वाटू लागली. स्वातंत्र्यानंतर आलेल्या काँग्रेसने अहिंसेच्या नावाखाली हिंदूंना दुबळे बनवले, ज्यामुळे हिंदू समाजाचे सर्वाधिक नुकसान झाले, असा आरोप त्यांनी केला. २०२४ च्या निवडणुकीत आपण 'काठावर पास' झालो, अन्यथा आपली धडगत नव्हती, असे पोंक्षे यांनी नमूद केले. कुंभकर्णापेक्षाही हिंदू समाजाची झोप गाढ आहे. भारत हिंदूराष्ट्र होता, आहे आणि राहील असे केवळ बोलून उपयोग नाही, तर तो अधिकृतपणे हिंदूराष्ट्र घोषित व्हायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय शिक्षणपद्धती आदर्श होती याकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की, भारतात सर्व वर्ण समान मानले जात होते. ब्राह्मण श्रेष्ठ किंवा शूद्र कनिष्ठ असे कधीच नव्हते. सर्वांशी प्रेमाने आणि माणुसकीने वागणे हाच मानवधर्म हिंदू धर्म आहे. संपूर्ण विश्वासाठी प्रार्थना करणारा हिंदू धर्म आहे, मात्र ब्रिटिशांनी 'फोडा आणि झोडा' या नीतीअंतर्गत जातीभेद निर्माण केले, असेही त्यांनी सांगितले. आर्थिक नाकाबंदी हे सर्वसामान्य हिंदूंचे शस्त्र असल्याचे पोंक्षे यांनी म्हटले. एकेकाळी १०० टक्के हिंदू असलेले काश्मीर आज अल्पसंख्याकांचे झाले आहे, त्यामुळे हिंदूंनी जागरूक असणे गरजेचे आहे. भाजीपाला, फळे, सुतारकाम, इलेक्ट्रिशियन, रिक्षा, टॅक्सीवाले हे सर्व हिंदूच असतील याची खात्री करूनच आर्थिक व्यवहार करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, 'हलाल सर्टिफिकेट' असलेल्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आणि शेजारच्या घरातील मुलगी 'लव्ह जिहाद'ला बळी पडली तरी आपल्या घरातील मुलगी सुरक्षित आहे म्हणून शांत न बसण्याचे आवाहनही पोंक्षे यांनी केले.
पुणे शहरात दीड कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या एका व्यापाऱ्याची गुन्हे शाखेने सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून अपहृत व्यापाऱ्याला वाचवण्यात यश आले. ही घटना २४ मार्च २०२६ रोजी घडली होती. गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या या व्यापाऱ्याचे टिंबर मार्केट येथून काही अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. अपहरणानंतर आरोपींनी व्यापाऱ्याच्या पत्नीकडे तब्बल १ कोटी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४०(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. अपहृत व्यक्तीला कोणतीही इजा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. तपासासाठी गुन्हे शाखेची तीन पथके वेल्हा, डोणजे आणि खेड शिवापूर परिसरात रवाना करण्यात आली होती. या पथकांनी मिळालेल्या माहितीचे जलद विश्लेषण करत शोधमोहीम राबवली. दरम्यान, आरोपींनी खंडणीची रक्कम मित्र मंडळ चौक, स्वारगेट येथे आणण्यास सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एक पथक तिथे तैनात केले. ठरलेल्या वेळी रक्कम घेण्यासाठी आलेल्या प्रणव निवंगुणे आणि साहिल खुटवड या दोन संशयितांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. या दोघांच्या चौकशीतून सौरव पवार, शिरीष खोपडे आणि मंदार दारवटकर यांनी अपहरण केल्याचे उघड झाले. तसेच, अपहृत व्यापाऱ्याला सिल्व्हर रंगाच्या इटिओस कारमधून खेड शिवापूर येथे नेल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपींना घेराव घालून छापा टाकला. या धाडसी कारवाईत अपहृत व्यापाऱ्याची सुरक्षित सुटका करण्यात आली आणि तिन्ही मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. सदरची कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, पुढील तपास स्वारगेट पोलिस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर पुणे शहर आणि ग्रामीण भागात अनेक गुन्हे दाखल आहेत.
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मंगळवारी सादर केलेल्या १५ हजार ६६९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावर बुधवारी सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली. सत्ताधारी भाजपने हा अर्थसंकल्प शहराच्या विकासासाठी दूरदर्शी असल्याचे सांगत स्वागत केले, तर विरोधकांनी निधी वाटपात भेदभाव आणि मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांना घेरले. भाजप नगरसेवकांनी अर्थसंकल्पातील विविध योजनांचे समर्थन केले. नगरसेविका वर्षा तापकीर, स्वरदा बापट आणि कल्पना बहिरट यांनी महिलांना मालमत्ता करात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले. हर्षवर्धन मानकर यांनी शहरी गरीब योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. नगरसेवक पुनीत जोशी आणि निवेदिता एकबोटे यांनी ‘पुणे फर्स्ट’ संकल्पनेवर आधारित हा अर्थसंकल्प शहराच्या विकासाचा स्पष्ट आराखडा मांडणारा असल्याचे सांगितले. सुरेंद्र पठारे यांनी ‘मिसिंग लिंक’ रस्ते आणि दत्तक रस्ता योजनेतून वाहतूक समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. मानसी देशपांडे यांनी बाणेर येथे मल्टिस्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय उभारण्याच्या निर्णयाचे स्वागत केले, तर अर्चना पाटील यांनी महिलांसाठी १०० नवीन स्वच्छतागृहे आणि शाळांमध्ये ‘पिंक रूम’ उभारण्याच्या योजनेचे कौतुक केले. शहर हरित करण्यासाठी ५० लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, सुभाष नाणेकर यांनी टेकड्यांवर वृक्षलागवड करून अतिक्रमण रोखण्याचा सल्ला दिला. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेसचे नगरसेवक साहिल केदारी यांनी कोणताही कर वाढवला नसल्याचा दावा करत असताना पाणी बिलात अप्रत्यक्ष वाढ केल्याचा आरोप केला. तसेच रस्त्यांची वारंवार खोदाई आणि मालमत्ता नोंदीतील त्रुटींचाही मुद्दा त्यांनी मांडला. नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी सत्ताधारी नगरसेवकांना कोट्यवधींचा निधी देण्यात आला असून विरोधकांवर भेदभाव केल्याचा आरोप केला. सुनील शिंदे यांनी १०,५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगत त्यांना बोनस व प्रोत्साहन देण्याची मागणी केली. राकेश कामठे यांनी टेकड्यांचे संवर्धन, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील रखडलेली कामे आणि बोगदा प्रकल्पाबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावरून बुधवारी सभागृहात कोंढवा परिसरातील निधी वाटपाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आमने-सामने आले. राष्ट्रवादीचे नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी कोंढवा व मुंढवा भागाला जाणीवपूर्वक निधी देण्यात आलेला नाही, असा आरोप करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने जोरदार प्रतिवाद केला आणि घोषणाबाजीमुळे काही काळ सभागृहाचे वातावरण तापले. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बुधवारी चर्चा झाली. विरोधकांनी निधी वाटपात दुजाभाव झाल्याचा आरोप केला, तर सत्ताधाऱ्यांनी हा अर्थसंकल्प संतुलित व विकासाभिमुख असल्याचे सांगितले. चर्चेदरम्यान हाजी गफूर पठाण यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेचा उल्लेख करत कोंढवा भागाला निधी देताना अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. विरोधक असल्यामुळे जाणीवपूर्वक निधी कमी देण्यात आला असून मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. शिक्षण क्षेत्रातही कोंढवा परिसरावर अन्याय होत असल्याचे सांगत महापालिकेच्या शाळांची संख्या कमी असल्यामुळे सुमारे १५ हजार विद्यार्थी खाजगी शाळांत शिक्षण घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. या शाळांना ७२-ब अंतर्गत निधी देण्याची मागणीही त्यांनी केली. पठाण यांच्या या विधानावर भाजप शहराध्यक्ष धिरज घाटे यांनी आक्षेप घेतला. केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात घेतला असून शहरातील इतर भागांतही मुस्लिम नागरिक राहतात आणि त्या भागांना निधी देण्यात आलेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पावरील चर्चेत विषयांतर न करता केवळ अर्थसंकल्पावरच बोलावे, असेही त्यांनी नमूद केले. घाटे यांच्यासह भाजपचे अन्य नगरसेवकांनीही आक्षेप घेत घोषणाबाजी केली. यावेळी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. या प्रकारामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र परिस्थिती तणावपूर्णच राहिली. अखेरीस महापौर मंजूषा नागपुरे यांनी हस्तक्षेप करत गफूर पठाण यांना केवळ अंदाजपत्रकावरच बोलावे असे सांगितले. तसेच त्यांच्या काही वक्तव्यांचा भाग सभागृहाच्या कामकाजातून वगळण्याचे आदेश दिले. या घटनेमुळे अर्थसंकल्पीय चर्चेला राजकीय रंग चढल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले.
खासदार शरद पवार यांनी डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला १२ लाख रूपयांची शिष्यवृत्ती, तर काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल,पुणे या संकुलसाठी ५० लाख रुपयेंचे बक्षिस दिले आहे. मुंबईत हर्षवर्धन सदगीरसह अर्जून पुरस्कार विजेते काका पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी उद्योजक श्री मोहसीन बागवान, कुस्ती प्रशिक्षक शिवाजी कोळी सर महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. हर्षवर्धन सदगीर यांचे कौतुक करीत ऑलिम्पिकपटू होण्यासाठी पुढील २ वर्षांसाठी महिना ५० हजार प्रमाणे १२ लाखांचे शिष्यवृत्ती धनादेश दिला आहे. काका पवार यांच्या तालमीतील हर्षवर्धनसह ११ मल्लांनी पदकाची लयलुट केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलला ५० लाख रूपयांचे शरद पवार यांनी आर्थिक सहाय्य दिले आहे. शरद पवार यांचे आभार व्यक्त करीत काका पवार म्हणाले की, पवार हे खेळाडूंसाठी तारणहार व आधार आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व पहिलवान व खेळाडू कायम ऋणी आहोत. पवार यांनी केवळ घोषणाच केली नाही तर धनादेश देऊन वेळीच विजेत्यांचे व प्रशिक्षण केंद्राचे कौतुक केले आहे. क्रिकेटनंतर इतक्या वेगाने पवार हेच कुस्तीगीरांसाठी अनेकदा धावून आले आहेत. हर्षवर्धन सदगीर यांनी सांगितले की, गुरूवर्य काका पवार यांच्या सल्ल्यानंतर मी पुन्हा महाराष्ट्र केसरीच्या मैदानात उतरणार आहे. परंतु ऑलिम्पिक खेळण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी शरद पवार यांची मदत प्रोत्साहन देणारी ठरली आहे. शासनाकडून नोकरीचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही काका पवार व हर्षवर्धन सदगीर यांनी भेट घेतली. त्यावेळी येत्या अधिवेशनात नाशिक महानगरपालिकेत नोकरी देण्याचे आश्चासन एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याचे काका पवार यांनी सांगितले आहे. या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी किताबावर नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने दुसऱ्यांदा आपले नाव कोरले. अंतिम लढतीत त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला पराभूत केले. महेंद्र गायकवाड या स्पर्धेत उपविजेता ठरला. सातवा 'डबल महाराष्ट्र केसरी' होण्याचा बहुमान नाशिकच्या अनुभवी हर्षवर्धन याने ६८ व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत गादी विभागात महेंद्र गायकवाडला पराभूत करत दुसऱ्यांदा किताबावर आपले नाव कोरले. हर्षवर्धनने अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडचा 4-2 ने पराभव करत, सातवा 'डबल महाराष्ट्र केसरी' होण्याचा बहुमान मिळवला.
अजितदादांच्या निधनानंतर पटेल-तटकरेंकडून राष्ट्रवादीवर कब्जा करण्याचा प्रयत्न
मुंबई : प्रतिनिधी अजितदादांच्या अपघाती निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना न सांगता निवडणूक आयोगाला पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी आज केला. यामुळे उपमुख्यमंत्री व पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाला पत्र पाठवून मध्यंतरीच्या काळात झालेले निर्णय ग्रा […] The post अजितदादांच्या निधनानंतर पटेल-तटकरेंकडून राष्ट्रवादीवर कब्जा करण्याचा प्रयत्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सरकारने यशवंतवाडीच्या शेतक-याला न्याय मिळवून द्यावा
लातूर : प्रतिनिधी लातूर ग्रामीणमधील रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडी येथील रहिवासी ज्योतीराम साहेबराव चव्हाण या शेतकरी बांधवाने शेताकडे जाणारा रस्ता भाजपच्या स्थानिक आमदाराच्या दबावामुळे खुला करून दिला जात नाही म्हणून विधानभवनासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा मंगळवारी प्रयत्न केला. या घटनेची माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी तातडीने दखल घेऊन सरकारने शेतक-याला न्याय मिळवून द्यावा, अशी […] The post सरकारने यशवंतवाडीच्या शेतक-याला न्याय मिळवून द्यावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बा वळण मार्गांच्या संचिका आहेत कुठे?
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाकडे गेल्या १५ वर्षांतील रेकॉर्डच उपलब्ध नसल्याची बाब समोर येताच महानगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली. रेकॉर्डच नसेल तर हा विभाग कशाच्या आधारे काम करीत आहे, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता शहराच्या बा वळण मार्गांच्या मार्गांच्या संचिकांचा शोध सुरु झाला असला तरी या संचिका नेमक्या कुठे आहेत, याचा […] The post बा वळण मार्गांच्या संचिका आहेत कुठे? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉ. राम बोरगावकर यांना मानव सेवा प्रतिष्ठानचा संगीतरत्न पुरस्कार प्रदान
लातूर : प्रतिनिधी मानव सेवा प्रतिष्ठान शेल्हाळ ता. उदगीर येथे आयोजित राज्यस्तरीय भजन स्पर्धा महोत्सवात लातूरचे ज्येष्ठ संगीतज्ज्ञ तालमणी डॉ. राम बोरगावकर यांना मानव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थांनचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर व माजी मंत्री, आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते राज्यस्तरीय संगीतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी […] The post डॉ. राम बोरगावकर यांना मानव सेवा प्रतिष्ठानचा संगीतरत्न पुरस्कार प्रदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उन्हाळ्यातील वाढत्या तापमानात ‘आरोग्य’ सांभाळा…!
लातूर : प्रतिनिधी सध्या वातावरणातील होणा-या बदलामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार मार्च महिन्यापासुनच आपण राज्यातील अनेक भागात तापमान वाढताना पाहत आहोत. सर्व साधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ अंश सेल्शियसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात किंवा सलग दोन दिवस एखाद्या भागात तापमान […] The post उन्हाळ्यातील वाढत्या तापमानात ‘आरोग्य’ सांभाळा…! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखणे व व्यावसायीक ठिकाणी घरगुती सिलेंडरचा वापर करणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्थापन केलेल्या पथकाने मागील पाच दिवसांत १६५ ठिकाणी छापे टाकून ३३ गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. या शिवाय आणखी काही ठिकाणांची तपासणी केली जाणार आहे. आखाती देशातील युध्दामुळे गॅस सिलेंडरवर पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांनी पाच तालुक्यांसाठी पाच पथके स्थापन केली आहेत. या पथकाच्या माध्यमातून घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यात आला आहे. या शिवाय व्यावसायीक सिलेंडर रुग्णालयांसाठी प्राधान्याने दिले जात आहे. मात्र जिल्ह्यात खानावळ, हॉटेल, ढाबे या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार या पथकांनी पाच दिवसांत १६५ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये ता. १६ मार्च रोजी ४८ ठिकाणी छापे टाकून २१ गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. ता. १७ मार्च रोजी ४३ ठिकाणी छापे टाकून ६ गॅस सिलेंडर जप्त केले. ता. २० मार्च रोजी १६ ठिकाणी छापे टाकले मात्र कुठेही घरगुती गॅ्स सिलेंडरचा वापर आढळून आला नाही. या सोबतच ता. २४ मार्च रोजी ३३ ठिकाणी छापे टाकून २ गॅस सिलेंडर तर बुधवारी ता. २५ एकूण २५ ठिाकणी छापे टाकून ४ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहे. या शिवाय पुढील काही दिवसांतच छापासत्र आणखी गतीमान केले जाणार असून प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागातील हॉटेलवर देखील तपासणी केली जाणार आसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांनी सांगितले.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सांगण्यावरूनच सातारा पोलिसांनी आमचे अपहरण केले होते. महाबळेश्वरच्या घाटात सातारा पोलिसांचा आम्हाला एन्काऊंटर करून संपवण्याचा डाव होता. पोलिस अधिकारी रमेश गरजे यांना त्यांच्या राजकीय बॉसचा म्हणजे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सारखा फोन येत होता, असा खळबळजनक आरोप जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई व संदीप मांडवे यांनी केला. याप्रकरणी वाई न्यायालयाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर सुमोटो गुन्हा दाखल करावा व जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्यावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासाच्या दृष्टीने उपलब्ध व्हावे याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष च्या निवडी पुन्हा घेण्यात याव्यात अशी मागणी यावेळी अनिल देसाई यांनी केली. आम्हाला पोलिसांनी फरफटत नेले अनिल देसाई म्हणाले, मतदानाच्या दिवशी आम्ही नेहमीप्रमाणे एका हॉटेलमधील बैठक संपवून जिल्हा परिषदेच्या सभागृहाकडे निघालो होतो. त्यावेळी पालकमंत्री स्वतः आमच्याबरोबर होते. आम्ही चौथ्या मजल्यावर गेलो असता, तेथे साध्या विषयातील शंभर एक पोलिस उभे होते. त्यांनी अचानक आम्हाला ताब्यात घेऊन जिल्हा परिषदेच्या मागच्या इमारतीमधील एका अरुंद पॅसेजमध्ये गाडी उभी होती तेथून त्यांनी आम्हाला सदर बाजार, मोळाचा ओढा तेथून मेढा मार्गे महाबळेश्वरच्या दिशेने गाडी पुढे नेली. सातारा पोलिसांनी अक्षरश: आम्हा दोघांना फरपटत नेले. संदीप मांडवे यांना 25 पोलिसांनी पकडले. यामध्ये त्यांचे कपडे फाटले आणि ते जखमी सुद्धा झाले. आमचा एन्काउंटर करतील, अशी भीती होती अपहरण तक्रार झालेले सदस्य बापूसाहेब शिंदे यांनी स्वतः महाबळेश्वर आणि वाई पोलिसांना जाऊन माझे अपहरण झाले नाही, असे निवेदन करूनही सातारा शहर पोलिस ठाण्यात पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे सातारा पोलिसांनी हे सर्व पूर्व नियोजित पद्धतीने केले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा पोलिस निरीक्षक रमेश गरजे यांना गाडीमध्ये फोन येत होता. आम्ही त्यांना सातारा येथील उपाधीक्षक कार्यालयात आमचा जबाब घ्या, पण आम्हाला मतदान करू द्या, अशी विनवणी केली. त्याला पोलिसांनी जुमानले नाही. गरजे यांच्या राजकीय बॉसचा फोन येताच अर्धे काम फत्ते झाले आहे, असे गरजे यांनी त्यांना सांगितले. आमचा महाबळेश्वर घाटात एन्काऊंटर करतील अशी आम्हाला भीती होती. पोलिस आम्हाला ताब्यात घेतील हे कोणालाच माहीत नव्हते. मात्र अतिशय असंवेदनशील पद्धतीने पोलिसांनी आमच्याशी वर्तणूक करून ऑपरेशन लोटस च्या नावाखाली राजकीय प्रतिनिधींच्या संगनमताने लोकशाहीचा गळा घोटला. मंत्री गोरेंच्या सांगण्यावरून आमचे अपहरण पोलिसांनी अपहरणाचा केवळ बनाव केला. बापूसाहेब शिंदे यांचे अपहरण झाले नाही, तर अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सांगण्यावरून अपहरण झाले. या कटाचे खरे सूत्रधार गोरे आहेत. यापुढे आमच्या जीवितास धोका आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना आम्ही निवेदन देणार आहोत. बापूसाहेब शिंदे यांचे चिरंजीव विकास शिंदे याला पाचवडच्या टोल नाक्यावर कोणी आणले? तेथे काय प्लॅन शिजला? तेथे काय कोणाला भेटले? याबाबतचे सर्व पुरावे आमच्याकडे असून ते आम्ही कोर्टात सादर करणार असल्याचा इशारा अनिल देसाई यांनी दिला. आमच्यावर भविष्यात खोटे गुन्हे दाखल करू शकतात यापुढेही भविष्यात आमच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आमच्या संरक्षणाची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांची आहे. एलसीबीचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना कोर्टाने सर्व प्रकरणात नोटीस बजावली आहे. आमच्यावर सुद्धा भविष्यात खोटे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, अशी भीती अनिल देसाई यांनी व्यक्त करून जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सुमोटो सर्व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि जिल्हा परिषद इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासाच्या दृष्टीने उपलब्ध व्हावे अशी मागणी त्यांनी केली. न्यायालयात कायदेशीर दाद मागणार संदीप मांडवे यांनी सुद्धा पोलिसांनी जो अतिरेकी बळाचा वापर केला त्या गोष्टीचा निषेध केला. ते म्हणाले, 4 एप्रिल रोजी सभापती निवडी होणार आहेत. त्या दृष्टीने पुन्हा अशा पद्धतीचे पाप घडू नये. हे राज्य दरोडेखोरांचे आहे की कायद्याचे असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे .सातारा जिल्हा परिषदेच्या सर्व सभांना पत्रकारांना बसू देण्यात यावे, असा पहिला ठराव आम्ही मांडणार असल्याचे मांडवे व देसाई यांनी सांगितले. तसेच सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड ही प्रक्रिया रद्द करून फेर निवड करण्यात यावी, याबाबत आम्ही कायदेशीर दाद सातारा जिल्हा न्यायालयात मागणार असल्याची अनिल देसाई व संदीप मांडवे यांनी सांगितले. अरुण देवकर यांना बजावली गेली नोटीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे यांच्या अपहरण आरोपात अटकेमधील असणारे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई व संदीप मांडवे यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उदय इवारे यांनी जामीन मंजूर केला. यावेळी वैद्यकीय तपासणी अहवालात पोलिसांनी देसाई व मांडवे यांना मारहाण केल्याचा आरोप प्राथमिकदृष्ट्या आधार असल्याचे न्यायालयाने नमूद केले. कोठडीत मारहाण केल्याच्या कारणावरून सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, याची माहिती अनिल देसाई व संदीप मांडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अटक प्रक्रियेनंतर मांडवे व देसाई यांना महाबळेश्वर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. सरकारी वकील व दोन्ही सदस्यांची वकील या प्रकरणातील पिडीत पक्षाचे म्हणणे न्यायालयाने ऐकले. त्यानंतर न्यायालयाने केस डायरी रिमांड अर्ज व वैद्यकीय कागदपत्रांचा आढावा घेतला. सदस्यांच्या वकिलांनी 20 मार्चला न्यायालयात उशिरा हजर केल्याचे सांगितले. पोलिसांच्या वतीने दोघा सदस्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती. परंतु सुनावणी दरम्यान पीडित पक्ष म्हणजे ज्यांच्या अपहरण झाले होते त्यांनीही सरकारी म्हणण्याला दुजरा दिला नाही. वैद्यकीय अहवालात सदस्यांवर अत्याचार झाल्याचे संकेत मिळत असल्याने पुढील पोलिस कोठडी देणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट करत दोघांना जामीन मंजूर केला व स्थानिक गुन्हे शाखेच्या अरुण देवकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर पलटवार करताना मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. अजितदादांच्या अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये काय घडलं, तिथपासून ते पोस्टमॉर्टमपर्यंतची इत्यंभूत माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे मर्यादा ओलांडू नका, अन्यथा मला तोंड उघडावे लागेल, असा खळबळजनक इशारा तटकरे यांनी दिला आहे. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांनंतर तटकरे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला होता की, खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिवंगत नेते अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष स्वतःच्या ताब्यात घ्यायचा होता. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या आरोपांवर सुनील तटकरे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत रोहित पवारांवर पलटवार केला. आम्ही अजितदादांची सावली बनून साथ दिली रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना तटकरे म्हणाले, माझ्यावर टीका होणे ही काही नवीन गोष्ट नाही. २०१४ सालापासून मला सातत्याने टार्गेट केले जात आहे. मात्र, मी कायम अजितदादांसोबत होतो. एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय असो किंवा पक्षाची पुढील रणनीती, आम्ही सावलीसारखे त्यांच्या पाठीशी उभे होतो. अजितदादांनी राज्याच्या राजकारणात मिळवलेली पकड आणि त्यांची उंचावलेली प्रतिमा यात आमचाही खारीचा वाटा होता. रोहित पवार प्रसिद्धीसाठी मला टार्गेट करत आहेत. गुपितांचा स्फोट करण्याचा इशारा सुनील तटकरे यांनी यावेळी रोहित पवारांचे नाव न घेता त्यांना 'शांत' राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, अजित पवार यांचा अपघात झाल्यानंतर त्यांचे पार्थिव हॉस्पिटलला आणल्यापासून ते पोस्टमॉर्टमपर्यंत नेमके काय काय घडले, याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे कृपया थांबा, अन्यथा भविष्यात मला अनेक गोष्टी जाहीर कराव्या लागतील. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, तटकरे नेमक्या कोणत्या 'गुपितां'बद्दल बोलत आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे. पवार कुटुंबियांविरोधातील ‘कटकारस्थाना’चा दावा सुनील तटकरे यांनी केवळ पक्षावरच नाही, तर पवार कुटुंबातील सदस्यांविरुद्ध सुरू असलेल्या हालचालींवरही भाष्य केले. सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधात तुम्ही काय कटकारस्थान रचत होता, याची माहिती आमच्या सर्वांकडे आहे. आपल्याला सुसंस्कृत पद्धतीने राजकारण करायचे आहे, त्यामुळे ज्याला हा इशारा आहे त्याने तो समजून घ्यावा आणि वेळीच थांबावे, असेही तटकरे यांनी निक्षून सांगितले. राजकीय संघर्षाला नवे वळण रोहित पवार विरुद्ध सुनील तटकरे असा हा सामना आता केवळ राजकीय तत्त्वांपुरता मर्यादित न राहता, वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या पातळीवर उतरला आहे. सुनील तटकरे यांनी दिलेल्या या सूचक इशाऱ्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्यांनी १५ हजार ६६९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प 'वास्तवापासून दूर' असल्याचे म्हटले. आकड्यांचा मायाजाळ रचून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जगताप यांच्या मते, प्रशासनाने मोठा अर्थसंकल्प सादर केला असला तरी, महापालिकेची उत्पन्न क्षमता १२ हजार कोटी रुपयांपर्यंतच मर्यादित राहण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असूनही राज्य सरकारकडून सुमारे ४ हजार कोटी रुपयांचा जीएसटी आणि अनुदानाचा निधी अद्याप मिळालेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जागतिक परिस्थितीमुळे गुंतवणूक घटल्यास महापालिकेच्या उत्पन्नावर आणखी परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. संपत्ती कर माफीच्या मुद्द्यावरही जगताप यांनी सत्ताधाऱ्यांवर 'फसवणुकी'चा आरोप केला. निवडणुकीपूर्वी ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना संपत्ती करमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ महिलांच्या नावावरील मालमत्तांना सवलत देऊन 'खानापूर्ती' केली जात आहे, असे ते म्हणाले. हा प्रकार जनतेची थेट फसवणूक असल्याचे त्यांचे मत आहे. पीएमपीएलच्या (PMPML) आर्थिक स्थितीवरही जगताप यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. २००७ मध्ये ९ लाख प्रवाशांवर केवळ १६ कोटी रुपयांचा तोटा होता. सध्या ११ लाख प्रवासी असूनही तोटा ८३० कोटी रुपयांवर पोहोचला आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले. पीएमपीएल प्रवाशांच्या सेवेसाठी नसून ठेकेदारांना पोसण्यासाठी चालवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात पाणीटंचाई गंभीर रूप धारण करेल, असा इशाराही जगताप यांनी दिला. १९९१ मध्ये सुमारे २० लाख लोकसंख्येसाठी उभारलेली पाणीपुरवठा व्यवस्था आज ९५ लाखांहून अधिक लोकसंख्येवर ताणली गेली आहे. गेल्या अनेक वर्षांत पाणी व्यवस्थेवर ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी दिल्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. पूर्वी सात दिवस चालणारी चर्चा आता घाईघाईत पूर्ण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षातील नगरसेवकांना कमी निधी देऊन भेदभाव केला जात असल्याचे सांगत, सत्ताधाऱ्यांनी 'खुनशी' राजकारण टाळावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा महत्त्वाचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती देत तसह तपासाचे तपशीलही मांडले. आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेवर देखील फडणवीस यांनी सविस्तर उत्तर देत आपण अपघाताच्या चौकशीच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच यात कोणाच्या बापालाही सोडणार नसल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांना दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा सन्माननीय रोहित पवार आणि इतरही अनेकांनी हा मांडला आहे. मी सुरुवातीला याची वस्तुस्थिती मांडतो. दिनांक 28.1.2026 रोजी बारामती विमानतळ येथे धावपट्टी लगत VSR कंपनीच्या विमानाचा अपघात झाला आणि या दुर्घटनेत अजितदादा पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. यासंदर्भात केंद्र सरकारने जी काही एसओपी आहे त्यांची कारवाई सुरू केली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देखील आपण चौकशी दिली आहे. सीआयडी याचा तपास एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. आता त्यातली जी काही निरक्षण आहेत, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासासाठी भाडे तत्त्वावर हवाई वाहनांना पुरवठा करण्यासाठी शासनाने दोन एजन्सी नियुक्त केल्या आहेत. दिनांक 27.1.2026 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मुंबई ते बारामती प्रवास निश्चित झाला. या दौऱ्याची माहिती त्यांचे खासगी सचिवांकडून एरो एयरक्राफ्ट सेल्स या कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आले. त्यानंतर 28 तारखेला मुंबई ते बारामतीच्या दौऱ्यासाठी कंपनीकडून 20 वाजून 45 मिनिटांनी विमान बूक करण्याबाबत कारवाई करण्यात आली. अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशीची टाइम लाइन देवेंद्र फडणवीस म्हणाले, पायलट सुमित कपूर यांची ब्रेथ अॅनलायझर टेस्ट 28 तारखेला सकाळी 7 वाजून 9 मिनिटांनी व कोपायलट शांभवी पाठक यांची टेस्ट सकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी विमानाच्या उड्डाणापूर्वी करण्यात आली. या टेस्टमध्ये अल्कोहोलचा अंश नाही. अजित पवार हे देवगिरी निवसस्थानवरून विमानतळावर सकाळी 7 वाजून 52 मिनिटांनी पोहोचले. अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक विमानात बसले आणि विमान सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी मुंबई विमानतळावरून उड्डाण झाले. मुंबई विमानतळ परिसर तसेच बारामती विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्यात आले आहेत. मुंबईच्या विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अजित पवार आल्याचे तसेच विमानात बसल्याचे दिसते. परंतु, बारामती विमानतळावर सदर विमान लँड होण्यापूर्वीच दुर्घटनाग्रस्त झाले. अजित पवारांच्या पोस्ट्मॉर्टम रिपोर्टमध्ये काय आढळून आले? देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, सदर प्रकरणी पोस्ट्मॉर्टम रिपोर्ट प्राप्त झाला असून दुर्घटनाग्रस्त विमानातील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर चार यांचे मृत्यूचे कारण डेथ ड्यू टु मल्टिपल इन्जुरीज असोसियटेड विथ बर्न इन्जुरीज असे देण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत्यू पावलेल्या सर्व सदस्यांचे डीएनए अहवाल आले असून ते त्यांच्या नातेवाईकांशी जुळले आहेत. पायलट व कोपायलट यांचा व्हीसेरा व रक्त तपासणी अंती अल्कोहोल अथवा अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न होत नाही. दुर्घटनाग्रस्त विमानातील सर्व मृत पावलेल्या सर्व पाच जणांचा व्हीसेरा व रक्त तपासणीत विषाचा अंश आढळून आलेला नाही. तसेच विमानातील स्फोटक पदार्थांचा अंश नसल्याबाबत राखेच्या तपासणीत न्याय सहाय्यक वैज्ञानिक शाळा यांच्याकडून अहवाल प्राप्त झाला आहे. अजितदादा यांच्याशी संबंधित लोकांशी चौकशी करण्यात आली असता सदर विमानातून इंधनाचे वेगळे कॅन वाहून नेल्याचे आढळून आले नाही. पायलटची नेमणूक देवेंद्र फडणवीस म्हणाले, 27 तारखेला 21 वाजून 11 मिनिटांनी स्लॉट आलोटमेंटसाठी तात्पुरत्या स्वरूपात विमानाचे क्र्यु डीटेल म्हणून पायलट म्हणून कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश यांच्या नावाचा मेल बारामती विमानतळ डायरेक्टर यांना करण्यात आला होता. अशा प्रकारचे नावे देऊन स्लॉट निश्चित करण्याची पद्धत आहे, त्यानंतर पायलट व कोपायलटची नेमणूक केली जाते अशी माहिती VSR कंपनीकडून देण्यात आली आहे. त्यानंतर या दौऱ्यासाठी कॅप्टन राहुल ओबेरॉय व दिलीप सिंह यांना नेमण्यात आले. मात्र राहुल ओबेरॉय यांचे पोट खराब असल्याने त्यांना संध्याकाळच्या लातूर दौऱ्यासाठी नेमले. त्यांच्या ऐवजी कॅप्टन सुमित कपूर व शांभवी पाठक यांना नेमण्यात आले. त्यामुळे त्यांची नेमणूक अचानक नव्हती केली. तसेच त्यांनी उड्डाण करण्यापूर्वी व्यवस्थित आराम केला होता. बारामती विमानतळ अनफिट आढळून आले देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकूणच तपासात तांत्रिक डेटा विश्लेषण, घटनास्थाळ तपासणी, हवामान परिस्थितीचा अभ्यास या सगळ्या गोष्टींवर विशेष भर देण्यात आला आहे. एएआयबी नुसार बारामती विमानतळावर अधिकृत मेटेरिओलॉजीकल सुविधा उपलब्ध नाही. व्हीएफआर उड्डाणासाठी आवश्यक दृश्यमानता ही किमान 5000 मिटर पेक्षा जास्त अपेक्षित आहे. तथापि घटनेच्या वेळी दृश्यामनता 3000 मिटर इतकी होती. विमानतळावर विंडसॉक शिवाय कोणतेही उपकरण उपलब्ध नाही. त्यामुळे सदर लॅंडींग हे दृश्यमानतेवर अवलंबून होते. विमानतळावर स्वतःची एआरएफएफ उपलब्ध नाही. सन 2016 नंतर रनवेचे डांबरीकरण झाले नव्हते. तसेच त्यावर खडी व चिन्हे फिकी झालेली आढळून आली. बारामती विमानतळ हे अनफिट आढळून आले. तसेच आता याचा पाठपुरावा सुरू आहे. झीरो एफआयआर कर्नाटक सरकारला दाखल करून घेण्याचा अधिकार नाही रोहित पवार यांनी कर्नाटकमध्ये एफआयआर दाखल केला आहे. महाराष्ट्रात एफआयआर दाखल होऊन अजितदादांना न्याय मिळू शकला नाही, अशी खंतही रोहित पावर यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली. झिरो एफआयआर म्हणजे काय? हे सांगताना कर्नाटक सरकारला अशा प्रकारचा एफआयआर दाखल करून घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले. अजितदादांच्या अपघातामागे घातपात असेल तर कोणालाही सोडणार नाही, असे आश्वासनही यावेळी फडणवीस यांनी दिले. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कधी कधी राजकीय कारणाने लोकांची नावे टाकली जातात, पण चार्जशीट नाही होत. क्रिमिनल जस्टिस आपण समजली पाहिजे. अपघाताच्या केसमध्ये आपण एडीआरनेच आपण करत असतो. म्हणून मला असे वाटते की कदाचित रोहित पवारांचे ते काका होते, पण आमचेही मित्र होते. त्यांच्या जवळचे लोक सांगू शकतील की जेवढे माझ्यासोबत त्यांची मैत्री झाली होती, तेवढी कोणसोबत नसेल झाली. अगदी मी उदाहरण सांगतो, मी बावनकुळे साहेबांना बुक्की मारली तर एफआयआर होईल. पण अपघात प्रकरणी एडीआर होतो. आपण राहुल गांधींना भेटलात. त्यानंतर तुम्ही कर्नाटकात जाऊन एफआयआर दाखल केला. एफआयआर दाखल होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न का करावे? अजितदादांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे अगोदर एडीआर होतो. एडीआर नंतर एफआयआरमध्ये रुपांतरीत होतो. या अपघाताप्रकरणी कर्नाटकमध्ये झीरो एफआयआर दाखल झाला. परंतु हा झिरो एफआयआर हा बेकायदेशीर आहे. कर्नाटकला हा झिरो एफआयआर घेण्याचा अधिकार नाही. ज्यावेळी पीडित एफआयआर करण्याच्या स्थितीत नसेल, तेव्हाच पीडित व्यक्तीला झिरो एफआयआर करता येतो. झिरो एफआयआर दाखल करणे हे कर्नाटक सरकारच्या अधिकारातच नाही, असा कायदा यावेळी फडणवीस यांनी सांगितला. कोणाच्याही बापाला सोडणार नाही तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, एफआयआर दाखल झालाच पाहिजे, असे तुम्हाला वाटत असेल तर भारतीय न्याय संहितेतील तरतुदीनुसार तुम्हाला न्यायालयात दाद मागता येते. त्यानंतर न्यायालय एफआयआर दाखल करा असे निर्देश देते. राजकीय दृष्टीकोन ठेवून कर्नाटक राज्याने हे कृत्य केले आहे. महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हे केले आहे, असा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला. आम्ही आकाश पातळ एक करू. अजितदादांचा घातपात असेल तर या प्रकरणात कोणाच्याही बापाला सोडणार नाही, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील 'कलम १५५' चा गैरवापर करून बेकायदेशीर आदेश पारित केल्याच्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या तपासणीत एकूण ४२४ प्रकरणांमध्ये गंभीर अनियमितता आढळली असून, या प्रकरणांशी संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली. पुणे जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत महसूल कायद्यातील तरतुदींचा गैरवापर करून पारित झालेल्या आदेशांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने ३८,०२७ प्रकरणांची प्राथमिक तपासणी केली, ज्यापैकी कागदपत्रे उपलब्ध झालेल्या २,३३७ प्रकरणांपैकी ४२४ प्रकरणांमध्ये बेकायदेशीर कार्यपद्धतीचा अवलंब करून आदेश पारित केल्याचे समोर आले आहे. या ४२४ प्रकरणांचे गांभीर्यानुसार 'अ', 'ब' आणि 'क' अशा तीन गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये 'अ' गटातील अतिगंभीर १३ प्रकरणांतील दोषींवर निलंबन आणि फौजदारी कारवाईबाबत कायदेशीर मत घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. तसेच, ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ३० पेक्षा जास्त प्रकरणांत अनियमितता केली आहे, त्यांना तातडीने निलंबित करण्याची शिफारस समितीने केली असून त्यानुसार कारवाई प्रस्तावित आहे. या प्रकारामुळे बाधित झालेल्या पक्षकारांना न्याय देण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बेकायदेशीर ठरवण्यात आलेल्या या सर्व प्रकरणांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत 'सुओ-मोटो' (स्वतःहून) पुनर्रिक्षण करण्यात येणार असून, पुढील सहा महिन्यांत मालमत्तेचे मूळ दस्तऐवज पुन्हा प्रस्थापित केले जातील. तसेच 'ब' गटातील गंभीर स्वरूपाच्या अनियमिततेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची पुणे विभागाबाहेर अकार्यकारी पदावर बदली करण्यात येणार आहे. केवळ पुणेच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील इतर विभागांमध्येही अशा प्रकारच्या प्रकरणांची तपासणी करण्यासाठी नाशिक समितीच्या धर्तीवर समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. या समित्या सहा महिन्यांत आपला अहवाल सादर करतील. महत्त्वाचे म्हणजे, भविष्यात कलम १५५ चा असा गैरवापर टाळण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमात आवश्यक सुधारणा करणारे विधेयक सन २०२६ च्या आगामी पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल, असेही महसूलमंत्र्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले.
चीनचा ‘पिंगलू कालवा’ प्रकल्प अंतिम टप्प्यात
बीजिंग : चीनमध्ये उभारण्यात येत असलेला ८३ मैल (सुमारे १३४ किमी) लांबीच्या पिंगलू कालवा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चीनच्या अंतर्गत भागातून थेट समुद्रमार्गे मालवाहतूक शक्य होणार आहे. या प्रकल्पाकडे जगभरातील व्यापार आणि पायाभूत सुविधा क्षेत्राचे लक्ष लागले आहे. हा कालवा ग्वांग्शी प्रांतातील नॅनिंग परिसरातून सुरू होऊन चिनजियांग नदीमार्गे बेईबू […] The post चीनचा ‘पिंगलू कालवा’ प्रकल्प अंतिम टप्प्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात गॅस पुरवठा खंडित करण्याची धमकी देऊन एका व्यक्तीची सायबर चोरट्यांनी ४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. मॉडेल कॉलनीतील रहिवाशाला लक्ष्य करत ही घटना घडली असून, शिवाजीनगर पोलिसांनी अनोळखी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चतुःशृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर येथे राहतात, जिथे पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा होतो. सायबर चोरट्यांनी त्यांना गॅस बिल थकित असल्याचे आणि पुरवठा खंडित केला जाईल अशी भीती दाखवली. थकित बिल त्वरित ऑनलाइन भरण्यासाठी बँक खात्याची माहिती द्यावी लागेल, असे चोरट्यांनी सांगितले. तक्रारदाराने आपली बँक खात्याची माहिती दिल्यानंतर, चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक हॅक केला. यानंतर, त्यांनी बँक खात्यातून ३ लाख ९८ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने दुसऱ्या खात्यात जमा केले. खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून गॅस आणि वीज देयक थकित असल्याचे सांगून पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या फोन कॉल्स किंवा मेसेजेसपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ‘तुझ्या समोर हत्याराचे पोते ओतून तुझ्यावर गोळीबार करतो’, लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल रागाने बघत असलेल्या गैरसमजातून एकाला तुझ्या समोर हत्यारांचे पोते ओतून तुझ्यावर गोळीबार करून तुझा कार्यक्रमच करतो अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार कोलवडी येथील धांदे फार्म येथे घडला. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश प्रकाश गायकवाड आणि सुरज रविंद्र गायकवाड (दोघेही रा. कोलवडी, माळवाडी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उमेश कैलास लोणकर (38, रा. मु. पो. कोलवडी, लोणकरवस्ती) यांनी फिर्याद दिली आहे.
देशातील रक्तपेढ्यांवर आता ‘डिजिटल’ पाळत
नवी दिल्ली : देशभरातील रक्तपेढ्यांवर आता सरकारची डिजिटल नजर राहणार आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) ने सर्व परवानाधारक रक्त केंद्रांसाठी ई-रक्तकोष पोर्टलवर नोंदणी अनिवार्य केली आहे. याचा उद्देश देशभरात रक्ताच्या उपलब्धतेची एक केंद्रीकृत प्रणाली तयार करणे आणि काळाबाजार रोखणे हा आहे. यावेळी सर्वात मोठा बदल हा आहे की ई-रक्तकोषला थेट तपासणी (इन्स्पेक्शन) प्रक्रियेचा […] The post देशातील रक्तपेढ्यांवर आता ‘डिजिटल’ पाळत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मेसमध्ये जलशुद्धीकरण यंत्रात वीज प्रवाह उतरल्याने एका विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. चैतन्य कुंडलिक चव्हाण (वय २३, रा. डोंगरगाव, ता. आष्टी, जि. बीड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी दोषींवर कारवाई करण्याची आणि सुरक्षाविषयक लेखापरीक्षण करण्याची मागणी केली आहे. चैतन्य चव्हाण हा कृषी महाविद्यालयात ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. तो 'ई मेस' समितीचा सदस्य होता, जी मेसचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी कार्यरत असते. १४ मार्च रोजी चैतन्य मेसच्या कामकाजाची पाहणी करत असताना, जलशुद्धीकरण यंत्र (फिल्टर) व्यवस्थित काम करत आहे की नाही, हे तपासत होता. त्याचवेळी अचानक यंत्रात वीज प्रवाह उतरला आणि त्याला विजेचा धक्का बसला. विजेचा धक्का लागल्याने चैतन्य बेशुद्ध पडला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली. गृहप्रकल्पात काम करताना तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू नियोजित गृहप्रकल्पात काम करताना तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजूर तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव भागात घडली. मजुराला सुरक्षाविषयक साधने न पुरविता दुर्धटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जोतीराम राजाराम शेवाळे (मूळ रा. उमदी, ता. जत, जि. सांगली) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. याबाबत शेवाळे याचे चुलतभाऊ याबाबत रामचंद्र सदाशिव शेवाळे यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोतीराम हा आंबेगाव परिसरातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या ठिकाणी काम करत होता. तळमजल्यावरील डक्ट मधील खड्ड्यात तो मृतावस्थेत सापडला. इमारतीच्या गच्चावरील काही भाग अर्धवट उघडा होता. तेथे काम करत असताना जोतीराम हा तोल जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ठेकेदाराने सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याने दुर्घटना घडल्याचे जोतीराम याचे चुलतभाऊ रामचंद्र यांनी फिर्यादीत सांगितले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली.
जर जादूटोणा करून समस्या सुटल्या असत्या, तर आपण ड्रोनऐवजी लिंबू-मिरचीने युद्ध लढलो असतो आणि सीमेवर सैनिक पाठवण्याऐवजी पाच-दहा भोंदूबाबांना पाठवून सीमा सुरक्षित केल्या असत्या. एवढेच नाही तर दहशतवाद्यांना घरबसल्या टाचण्या टोचून संपवले असते, अशा बोचऱ्या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केला. विधिमंडळ अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना त्यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर भाष्य करत संबंधितांवर कडक कारवाईचा इशारा दिला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, काल मी विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी सविस्तर निवेदन केलेले आहे. काही सदस्यांनी त्यासंदर्भात आपले मत व्यक्त केले. मी त्यांनाही विनंती करेल आणि इतरांनाही विनंती करेल की ज्यांच्याकडे या संदर्भात काहीपण माहिती आली असेल, तर ती माहिती शासनापर्यंत पोहोचवावी. कारण या प्रकरणाची संपूर्ण पाळंमुळं खणून त्या व्यक्तीला अशा पद्धतीने आपल्याला दंडित करायचे आहे की, अशापद्धतीने वागणाऱ्यांना लोकांना कुठेतरी जरब बसली पाहिजे. या प्रकरणामुळे आज पण नेमके कुठे जात आहोत याचा देखील विचार करण्याची वेळ आली आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील पुसट रेषा देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण नेहमी असे म्हणतो की, आत्मविश्वास असावा, पण अतिआत्मविश्वास असू नये. तसेच आपण सगळे श्रद्धा मानणारे लोक आहोत. अश्रद्ध लोक नाही आहोत. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये खूप छोटी लाईन आहे आणि ती लाईन ज्यावेळेस व्हायलेट होते, त्यावेळी काय परिस्थिती होते ते या प्रकरणातून आपण बघितलेले आहे. एक प्रकारे अंधश्रद्धेमध्ये कशापद्धतीने विवेक हरवतो हे आपल्याला या प्रकरणात पाहायला मिळालेले आहे. संतांच्या परंपरेचा दाखला महाराष्ट्राच्या थोर संत परंपरेचा उल्लेख करत फडणवीस यांनी संतांनी अंधश्रद्धेवर कसे प्रहार केले, याची आठवण करून दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपला महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर माऊल, जगतद्गुरू तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराष्ट्र, संत सावता माळी, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत गुलाबराव महाराज, संत गाडगेबाबा, संत सेवालाल महाराज, अशी थोर परंपरा असलेला आपला महाराष्ट्र आहे. यांच्यापैकी कोणीही देवाचे अस्तित्व नाकारलेले नाही. पण या सगळ्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केलेले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी धर्म आणि श्रद्धेचा अर्थ पसायदानातून सांगितला. पसादाना सांगताना त्यांनी दुष्ट प्रवृत्तीवर प्रहार केलाय. अंधश्रद्धा, अज्ञान, अंधार हा सगळा नाहीसा झाला पाहिजे आणि जग ज्ञानरुपी प्रकाशमय झाले पाहिजे, अशाप्रकारची भावना आणि कामना जगाकरता केली आहे. भोंदूगिरीला कुठेही स्थान मिळता कामा नये देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगतद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. खरे देवत्व कुठे बघितले पाहिजे याचाही विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज जे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात संतांची शिकवण आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या प्रकरणातून निश्चितपणे सरकार म्हणून, समाज म्हणून प्रत्येकाला शिकायला मिळेल. उद्या रामनवमी आहे. प्रभू श्रीरामांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की, आपला महाराष्ट्र धर्म हा वाढला पाहिजे, पण भोंदूगिरीला कुठेही स्थान मिळता कामा नये, या दृष्टीने आपल्याला काम केले पाहिजे. जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम अंतिम टप्प्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्याकडे काही चांगले मुद्दे मांडण्यात आलेत. जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम झाले नाहीत, हा विषय या ठिकाणी आला. मी त्यांची माहिती घेतली असता, त्याचे नियम अंतिम टप्प्यात आहेत. कायदा व न्यायव्यवस्थेने त्याला मान्यता दिली आहे. पण ते नियम नसले, तरी सेक्शन ३ ॲक्टीव्हेट असल्यामुळे नियमांचा त्यात अडसर येत नाही. या कायद्याची अंमलबजावणी आपण ताकदीने केली आहे. याही प्रकरणात आपण कायद्याची अंमलबजावणी केली आहे. निवडणुकाही घरबसल्या जिंकता आल्या असत्या! देवेंद्र फडणवीस म्हणाले, जादूटोणा करून समस्या संपल्या असत्या, तर या भोंदू खरातला आपण ट्रम्पचा सुरक्षा सल्लागार निवडले असते. युद्ध आपण ड्रोन ऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो. दशतवाद्याना इथे बसून आपण टाचण्यांनी संपवून टाकले असते. सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता पडली नसती. पाच-दहा भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा नीट झाली असती. आपल्याला प्रचार सभा देखील घ्यावा लागल्या नसत्या. एका ठिकाणी बसून सगळ्या निवडणूका जिंकता आल्या असत्या. सकारात्मकता, प्रामाणिकता आणि कुणाचे अहित ज्यात होत नाही, ती खरी श्रद्धा आहे. ज्यात दुसऱ्याचे अहित होते, ती कधी श्रद्धा असू शकत नाही. ती अंधश्रद्धा आहे आणि याच्याविरुद्ध कडक पद्धतीने राज्य सरकार कारवाई करेल.
पुणे जिल्हा बँकेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक:बनावट नियुक्तीपत्र देऊन 2 लाखांची ठगवणूक, एकावर गुन्हा
पुणे जिल्हा सहकारी बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी ऋषीकेश गणेश वाघमारे (रा. सपकाळवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी येथे राहणाऱ्या एका तरुणाची आरोपी वाघमारे याच्याशी एका परिचितामार्फत ओळख झाली होती. वाघमारेने या तरुणाच्या पत्नीला पुणे जिल्हा सहकारी बँकेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नोकरी लावण्यासाठी आरोपीने तरुणाकडून दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आरोपीने तरुणाला पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या आवारात बोलावले. तिथे वाघमारेने मुख्य अधिकाऱ्यांच्या नावाने तयार केलेले बनावट नियुक्तीपत्र तरुणाला दिले. तरुणाने या नियुक्तीपत्राची चौकशी केली असता, ते बनावट असल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने आरोपीकडे पैशांची मागणी केली. मात्र, वाघमारेने पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. या प्रकारानंतर, पीडित तरुणाने नुकतीच बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण करत आहेत. कपडे विक्रेत्याकडे हप्ता मागणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल खडकी बाजारात कपडे विक्रेत्याकडे दरमहा पाच हजार रुपये हप्ता मागणाऱ्या एकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.सलमान शेख (वय २८, रा. खडकी) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका कपडे विक्रेत्याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कपडे विक्रेता दापोडी परिसरात राहायला आहेत. ते खडकी बाजारातील टिकाराम चौकात रॉयल हॉटेलसमोर कपडे विक्रीचा व्यवसाय करतात. आरोपी त्याठिक आल्यावर त्याने कपडे विक्रीसाठी दिलेल्या जागेसाठी दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागले. हप्ता न दिल्यास जागा मोकळी करुन दे, अशी धमकी आरोपीने त्यांना दिली. आरोपीने दिलेल्या धमकीमुळे घाबलेल्या कपडे विक्रेत्याने खडकी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर या असंख्य महिलांना अशोक खरातकडे घेऊन जायच्या, असा गौप्यस्फोट राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना आशा मिरगे यांनी रुपाली चाकणकर, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना त्यांची कार्यशैली तसेच अशोक खरातसोबत असलेल्या संबंधाच्या संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. आशा मिरगे म्हणाल्या, कुंपणच शेत खाते असे आपण ऐकले होते. पण इथे कुंपणच आख्ख शेत लांडग्यापुढे टाकत आहे असा प्रकार घडला आहे, असे म्हणत त्यांनी चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना कुठल्याही महिलेला आपल्या वाटल्या नाहीत, त्यांची उठबस नेहमी मंत्र्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये असायची असे मिरगे यांनी म्हटले आहे. दीपक केसरकर आणि चाकणकर अशोक खरातचे पार्टनर दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर हे अशोक खरातच्या पार्टनर असल्याचा आरोप आशा मिरगे यांनी केला आहे. अशोक खरातसोबत संबंध ठेवणाऱ्यांमध्ये अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी आहेत. त्यामध्ये त्यांचे काही मित्र देखील आहेत. काही लोक अशोक खरातचे पार्टनर असून त्यामध्ये दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचा नंबर येतो, असा आरोप मिरगे यांनी केला आहे. रुपाली चाकणकर महिलांना खरातकडे न्यायच्या आपल्या आजूबाजूच्या महिलांना आवर्जून अशोक खरातकडे न्यायचे काम रुपाली चाकणकर करायच्या असा थेट गंभीर आरोप आशा मिरगे यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, महिला संघटनांची मीटिंग असताना त्या मीटिंगला अशोक खरात जायचा. त्या मीटिंगमध्ये रुपाली चाकणकर अशोक खरातची स्तुती करायच्या. हा माझा पांडुरंग आहे, मी आज जिथे आहे तिथपर्यंत यांच्यामुळे पोहोचले असल्याचे चाकणकर म्हणायच्या. त्यामुळे समोर बसलेल्या भोळ्या भाबड्या महिला फासायच्या. त्या भोळ्या भाबड्या महिलांना अशोक खरातच्या जाळ्यात टाकायच्या, असा गंभीर आरोप मिरगे यांनी केला आहे. चाकणकरांचा ग्लॅमर पाहून अनेक महिलांना कॉम्प्लेक्स व्हायचा महिला आयोग हा महिलांना विश्वासाचे न वाटण्यामागचे कारण म्हणजे रुपाली चाकणकर होत्या. याच्या आगोदरच्या आयोगांच्या नावावर लक्ष टाकले असता, एखाद्या महिलेला त्या आपल्या वाटतील असे असायचे. पण रुपाली चाकणकरांचा ड्रेसिंग सेन्स, त्यांचा मेक अप, ग्लॅमर पाहून अनेक महिलांना कॉम्प्लेक्स व्हायचा. या महिलेचा वावर हा सतत मंत्री, अधिकारी यांच्यासोबतचा असायचा. त्या सतत राजकारण करायच्या. त्यामुळे कुणालाही त्या आपल्या वाटल्या नाहीत, असेही आशा मिरगे यांनी यावेळी सांगितले. प्रकरण बाहेर कसे आले? अशोक खरातचे प्रकरण बाहेर कसे आले, याविषयी सांगताना आशा मिरगे म्हणाल्या, नीरज जाधव हा अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काम करायचा. त्याचे लग्न झाल्यानंतर त्याच्या बायकोला अशोक खरातने भेटायला बोलावले. मग त्या नीरज जाधवला संशय आल्यानंतर त्याने अशोक खरातच्या कार्यालयात छुपे कॅमेरे लावले. त्यानंतर या बाबाच्या कार्यालयात जे काही होत होते त्याचे फुटेज घेऊन तो गायब झाला. तीन महिन्यानंतर त्याने एका एआरटीओ महिलेला गाठले आणि तिच्याकडून पैशाची मागणी केली. पुढे आशा मिरगे यांनी सांगितले की, हे समोर येताच त्या महिलेला धक्का बसला. कारण असे काही झाले असेल हे तिला समजले. अशोक खरातने तिला काहीतरी प्यायला दिले आणि त्यामुळे तिला गुंगी आली. त्यानंतर हे सगळे झाल्याचे तिला आणि तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. या प्रकरणी तिने शिर्डी या ठिकाणी नीरज जाधव विरोधात गुन्हा दाखल केला. ही गोष्ट अशोक खरातपर्यंत पोहोचली. हे प्रकरण अंगलट येणार असल्याचे समजताच त्याने नाशिकमध्ये तक्रार दाखल केली. फोटो मॉर्फ केल्याची तक्रार त्याने केली होती. पण ते फोटो आणि व्हिडीओ खरे असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये असलेल्या नीरज जाधवचा मोबाईल तपासल्यानंतर त्याच्याकडे 58 व्हिडीओ असल्याचे समोर आले. त्याचसोबत त्याच्याकडे अनेक व्हिडीओ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पुण्यात अल्पवयीन युवतींवर बलात्कार:चंदननगर परिसरात दोन आरोपींना अटक
पुणे शहरातील चंदननगर परिसरात अल्पवयीन युवतींवर बलात्कार झाल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध बलात्कार आणि बालकांचे लैंगिक संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या घटनेत, एका अल्पवयीन युवतीच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी बालाजी गुरुनाथ स्वामी (वय २७, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामीला युवती अल्पवयीन असल्याची माहिती होती. त्याने तिला जाळ्यात ओढून वेळोवेळी बलात्कार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर युवतीच्या आईने त्याला जाब विचारला असता, आरोपी स्वामी पीडित युवतीच्या घरात शिरला आणि तिची आई व वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत, अल्पवयीन युवतीवर बलात्कार करून तिची छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या ऋतिक रावसाहेब लोणके (वय २७, रा. सोमनाथननगर, वडगाव शेरी) याला अटक करण्यात आली आहे. पीडित युवतीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणके याने पीडित युवतीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. ही बाब युवतीच्या मावशीला समजल्यानंतर त्यांनी लोणके याला जाब विचारला. तेव्हा लोणके याने, मला तिच्याबरोबर बोलू दिले नाही, तर समाज माध्यमात युवतीची छायाचित्रे प्रसारित करेल, अशी धमकी दिली. दरम्यान, पुणे शहरात अल्पवयीन मुलींना विवाहाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. वाघोली आणि हडपसर पोलीस ठाण्याात दोन अल्पवयीन युवतींना फूस लावून पळवून नेण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी दोन्ही पोलीस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि बलात्कार प्रकरणातील तक्रारी प्राधान्याने नोंदवून घेण्याचे आदेश दिले आहेत.
भोंदू अशोक खरातचा कथित पीए असणारा रमेश हिंगे अखेर समोर आला आहे. त्याने अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा करत आपण त्याचा पीए नसल्याचेही स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी खरातकडे अनेक मंत्री व प्रशासकसीय अधिकारी येत असल्याचेही प्रामुख्याने नमूद केले. रमेश हिंगे याने बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले, मी एक शिक्षक आहे. मी बेपत्ता झालो नव्हतो. मी माझे काम करत होतो. मी अशोक खरातचा पीए नव्हतो व आत्ताही नाही. मी त्याचा मॅनेजरही नाही. मी केवळ सुट्टीच्या दिवशी ईशान्येश्वर मंदिरात जाऊन स्वयंसेवक म्हणून तिथे सेवा करत होतो. या ठिकाणी अनेक लोक, अधिकारी मंडळी येत होते. त्यांना पाहण्यासाठी मी तिथे जात होतो. पण अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांशी माझा कोणताही संबंध नाही. मी त्याच्या संस्थेत कोणत्याही पदावर नाही. ट्रस्टी नाही किंवा मॅनेजरही नाही. मी स्वयंसेवक, माझा खरातशी संबंध नाही रमेश हिंगे पुढे म्हणाले, मी ईशान्येश्वर मंदिरात जात होतो. तसा अशोक खरातच्या फार्म हाऊसवरही जात होतो. त्याचे फार्म हाऊस व तेथील बागा पाहण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी मी तिकडे जात होतो. रविवारच्या दिवशी माझ्यासारखे अनेक भाविक खरातच्या फार्महाऊसवर येत होते. त्यांच्या दर्शनासाठी किंवा त्यांना पाहण्यासाठी आम्ही जात होतो. एक स्वयंसेवक म्हणून पाहुण्यांना चहापाणी देणे एवढेच माझे काम होते. माझे खरात बरोबर आर्थिक व्यवहार नाहीत. कसलीही भागीदारी देखील नाही. त्यामुळे मला चौकशीसाठी बोलावले तर मी चौकशीसाठी जायला तयार आहे. अशोक खरात दर रविवारी फार्म हाऊसवर येत होता. काही वेळा तो महिनाभर तिकडे फिरकतही नसे. त्याच्याकडे येणारे सर्व लोक हे चांगल्या प्रकारचे प्रतिष्ठित लोक असायचे. ग्रामीण भाग असल्यामुळे आम्हाला हे मान्यवर पाहण्याची उत्सुकता असायची. तिथे येणाऱ्यांना मी ओळखतो. पण वैयक्तिकरित्या कुणाचे नाव सांगणे संयुक्तिक ठरणार नाही. पण तिथे मंत्री व मोठे अधिकारी येत होते हे खरे आहे. अशोक खरातवर बलात्काराचा गुन्हा अशोक खरात याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरातने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. करंगळ्या कापणाऱ्या 38 आमदारांची लिस्ट - जितेंद्र आव्हाड दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत अशोक खरातकडे जाऊन 38 आमदारांनी आपल्या करंगळ्या कापल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. ते म्हणाले, अशोक खरातच्या ठिकाणांवर सरकारी पैशांच्या माध्यमातून पाण्याच्या टाक्या व रस्ते बांधण्यात आले. एवढा कोण मोठा आहे तो खरात? कुठला काळ्या जादूवाला आहे. वाईट या गोष्टीचे वाटते की, या संत तुकारामांच्या, संत ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण काळ्या जादूला एवढी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूने काहीही होऊ शकते असे समस्त आमदारांना वाटायला लागले आहे. तिकडे जाऊन करंगळ्या कापणाऱ्या 38 आमदारांची लिस्ट आहे. अशी कशी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवली? हा खरात वेगवेगळ्या खात्यातील बदल्याही करत होता, असे आव्हाड आपला संताप व्यक्त करताना म्हणाले.
रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी
नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली आहे. एप्रिल महिन्यात या तेलाचा पुरवठा होणार आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू असल्याने होर्मूझच्या सामुद्रधुनीतील जल वाहतूठ ठप्प झाली आहे. त्यामुळे देशाला होणारा तेल पुरवठा आटला आहे. अमेरिकेने रशियन तेल खरेदीसाठी ३० दिवसांची मुभा दिली आहे. एप्रिलच्या पहिल्या […] The post रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

34 C