जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी, २१ एप्रिलपासून सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांनी संप पुकारला आहे. या संपात महसूल विभागाचे शंभर टक्के तर आरोग्य विभागाचे ७० टक्के कर्मचारी सहभागी झाले आहेत. परिणामी तहसील कार्यालयातून रोज दिले जाणारे दाखले आज मिळाले नाहीत. दुसरीकडे आरोग्य विभागातील परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यामुळे तेथील सुविधाही प्रभावित झाल्या. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात पर्यायी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. सरकारी-निमसरकारी-शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने या आंदोलनाची हाक दिली आहे. समितीचे निमंत्रक डी. एस. पवार यांच्या दाव्यानुसार मंगळवारी सकाळपासूनच विविध कार्यालयासमोर निदर्शने केली. संप असला तरी कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयासमोर एकत्र येत न्याय, हक्काच्या घोषणा दिल्या. काही कार्यालयांमध्ये विभागप्रमुखांना निवेदनेही देण्यात आली. त्यांच्यामते जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व तहसील व एसडीओ कार्यालये, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, वन विभाग, आरटीओ, हिवताप, नगरपालिका, विमा, बँकांसह जिल्ह्यातील सुमारे ३० हजार कामगार, कर्मचारी सहभागी उर्वरित. पान ४ संपामुळे जिल्हा कचेरीसह विविध कार्यालयांतील दालने अशी विना कर्मचारी दिसली. निदर्शने व धरणे आंदोलनासाठी जिल्हा कचेरीसमोर जमलेले प्रमुख पदाधिकारी. कंत्राटी आणि जीएमसीच्या भरवशावर रुग्णसेवा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालीटीमधील सुमारे ७० टक्के कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉक्टर्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आदी यंत्रणांमधील वैद्यकांची मदत घेऊन आरोग्य विभागाचा डोलारा चालवला जात आहे. कंत्राटी कर्मचारी आणि नव्याने भरती झालेले कर्मचारीही त्यांच्या मदतीला आहेत.
वर्षात 320 वीज चोऱ्या; 5.85 कोटींची चोरी उघड:जिल्ह्यात महावितरणच्या भरारी पथकाची कारवाई
जिल्ह्यातील वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकाने वर्षात कारवाई करत ३२० वीज चोरी प्रकरणांचा भंडाफोड केला . उपकार्यकारी अभियंता श्रीकांत तळेगावकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता शंकर राऊत, सहकाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी राबवली. जिल्ह्यात महावितरणच्या भरारी पथकाने विविध ठिकाणी धाडी मारत केलेल्या कारवाईत ३३ लाख २५, ६०३ युनिट वीज चोरी झाल्याचे उघड झाले असून, त्यांची किंमत सुमारे ५ कोटी ८४ लाख ६७ हजार आहे. भरारी पथकाच्या सतर्कतेमुळे हे प्रकार वेळेत उघडकीस आले. या मोहिमेत ३२ प्रकरणांत गुन्हे दाखल केले असून, विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत कारवाई केली. कलम १२६, इतर तरतुदींनुसार ९१ प्रकरणांवरही कारवाई केली आहे. भरारी पथकाने जिल्ह्यात संशयास्पद ठिकाणी छापे टाकले असता २२९ ठिकाणी वीज चोरी होत असल्याचे आढळले. तपासात वीज चोरीचे अनेक प्रकार उघड झाले. त्यात मीटरमधील वायर कापणे, मीटर बंद करणे, फ्लॅश प्रणाली निष्क्रिय करणे, मीटरला छिद्र पाडून त्यात रोधक निर्माण करणे, मीटर बायपास करून वीज वापरणे अशा पद्धतींचा समावेश आहे. वीज चोरीमुळे कंपनीला फटका बसतो, वितरण हानीत वाढ होते. वीज चोरीमुळे यंत्रणेवर अनधिकृत भार वाढून अखंडित वीज पुरवठ्याला अडथळा होतो. त्यामुळे महावितरणची वीज चोरी विरोधात मोहिम आक्रमकपणे राबवणार आहे, असे अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांनी स्पष्ट केले. ५ कोटी ४ लाख रुपयांची वसुली महावितरणने ३२० पैकी २९८ प्रकरणांमध्ये तडजोडीची संधी देत ५ कोटी ४ लाखांची वसुली केली आहे. मात्र,अद्याप २२ प्रकरणांत ८१ लाख ६३ हजारांची वसुली बाकी असून ती वसूल करण्यासाठी पुढील कारवाई सुरू आहे.
‘सायन्सस्कोर’वर आता स्वच्छता, स्नानगृह:महापौरांसह नगरसेवकांचा पुढाकार, नागरिकांनी केली होती मागणी
अमरावती बाहेरगावाहून शहरात येणारे, शहरवासीयांच्या सोयीसाठी सायन्सकोर मैदानावर अत्याधुनिक स्वच्छता व स्नानगृह उभारणार आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्यासोबत महापौर श्रीचंद तेजवानी यांची सोमवारी २० एप्रिलला यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेदरम्यान सीईओंनी संबंधित कर्मचाऱ्यांना या प्रकरणी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. ही जागा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असल्याने, तेथे शौचालय बांधकामासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेसाठी महापौरांनी जिल्हा परिषद प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. महापौरांनी कार्यतत्परतेचा प्रत्यय देत मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सायन्सस्कोर मैदानावर भेट दिली असता, नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेत त्यांनी तेथे स्वच्छतागृहे आणि स्नानगृहे उभारण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले आहेत. दररोज सकाळी उर्वरित. पान ४ आता सर्वांना मिळणार चांगल्या सुविधा सायन्सकोर मैदान हे शहरात मोक्याच्या ठिकाणी असून, त्यावर मेळावे, सभा, संमेलनं, प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. कशीतरी वेळ साजरी करण्यास फिरते प्रसाधनगृह ठेवले जाते. परंतु, ते असे काही घाणेरडे केले जाते की, महिलांना त्याचा वापर करता येत नाही. मैदानावर फिरण्यासाठी सकाळी व सायंकाळी महिला, युवती, ज्येष्ठ नागरिक येतात. त्यांच्यासह बाहेर गावाहून येणाऱ्या महिलांनाही सुविधा मिळावी, या उद्देशाने जर येथे कायम स्वच्छता व स्नानगृह झाले तर त्यांना कुचंबणा सहन करावी लागणार नाही. स्वच्छ, सुंदर अमरावतीसाठी महापौरांचे हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ‘ डीसीपीई’चे माजी प्राचार्य, बृहन महाराष्ट्र योग परिषदेचे सर कार्यवाह डॉ.अरुण खोडसकर याचा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्य मास्टर्स योगासन स्पर्धेमध्ये महाराष्ट्र योगासना स्पोर्ट असोसिएशन, बृहन महाराष्ट्र योग परिषदचे अध्यक्ष संगमनेरचे डॉ.संजय मालपाणी यांच्या हस्ते फेटा बांधून व योगासन मूर्ती प्रदान करून सत्कार केला . श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने योगासनाचा प्रचार केला.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तर मंडळाच्या योग प्रचार व प्रसार कार्याला वेग आला. गेली ५० वर्षे मंडळातील योगासनाच्या प्रचार व प्रसाराचे कार्य एचव्हीपीएमचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. अरुण खोडस्कर करीत आहेत. केवळ देशातच नव्हे तर विदेशातही त्यांनी योगासनाचा प्रचार केला असून अनेक विदेशी नागरिकांना योगासनाचे प्रशिक्षण दिले. एचव्हीपीएमच्या पुढाकाराने जम्मू्-काश्मीरात आयोजित आंतरराष्ट्रीय योग संमेलनाचे त्यांच्या मार्गदर्शनात आयोजन केले होते. राष्ट्रीय, राज्ययोगासन स्पर्धा, जिल्हा योगासन स्पर्धा, योगासनावर आधारित आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय चर्चासत्रांत त्यांची मोलाची भूमिका राहिली आहे. त्यांनी योगाच्या प्रसारासाठी स्वत:ला वाहून घेतल्यामुळे त्यांचा सन्मान होत असतो.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक आज रात्री वर्षा निवासस्थानी पार पडणार असून, या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर काही निवडक नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि हालचाल वाढली आहे. या निवडणुकीत एकूण 10 जागांपैकी भाजपच्या वाट्याला 6 जागा येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या सहा जागांसाठी कोणाला उमेदवारी मिळणार, यावर पक्षांतर्गत जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, यावेळी पक्षातील जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याचा विचार होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याशिवाय जातीय आणि प्रादेशिक समतोल साधण्यावरही भर दिला जाणार आहे. पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. उर्वरित पाच जागांसाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावे पुढे येत असून, अंतिम निर्णय मात्र केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीनंतरच होणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी मुंबईत गाठीभेटी वाढवल्या असून, सह्याद्री अतिथीगृहासह विविध ठिकाणी राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. या सर्वांनी आपापल्या पातळीवर लॉबिंग सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अंतिम यादी जाहीर होईपर्यंत पक्षातील वातावरण तापलेले राहणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक 12 मे रोजी होणार आहे. मतदान सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होणार असून, त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, आमदारांना दोन वेळा मतदान करावे लागणार असून, दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळे मतदानाचे गणित असणार आहे. अंतर्गत संतुलन साधण्याची मोठी कसोटी सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार, महायुतीला 10 पैकी 9 जागांवर विजय मिळवणे सहज शक्य असल्याचे मानले जात आहे, तर महाविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक केवळ औपचारिक नसून, अंतर्गत संतुलन साधण्याची मोठी कसोटी ठरणार आहे. आता अंतिम यादीत कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय भीम हा अभिवादनाचा शब्द नाही, तर तो सामाजिक परिवर्तनाची प्रखर ऊर्जा आहे. समानता, स्वातंत्र्य, बंधुतेचा संदेश या एका घोषवाक्यात सामावलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा ‘जय भीम’मधून प्रत्येकाच्या मनात चेतना निर्माण करते. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद, शिक्षणाची जिद्द आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा ‘जय भीम’ या मंत्रातूनच मिळते. त्यामुळे ‘जय भीम’ ही नव्या भारताच्या उभारणीची शक्ती आहे,” असे प्रतिपादन अॅड. यशोमती ठाकूर यांनी केले. नांदगाव पेठ येथे आयोजित क्रांतीपर्व या वैचारिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरूनत्या बोलत होत्या. सम्राट अशोक, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त प्रज्ञास्पर्श बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत पटांगणात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. यशोमती ठाकूर उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून कैलाश मोरे, प्रशासक कविता डांगे, सभापती हरीश मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे, भारतीय दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर शेंडे, विनोद डांगे, नितीन हटवार, गंगाधर खडसे, श्रीधर राऊत, प्रा. मोरेश्वर इंगळे,वृषाली इंगळे, राजेश बोडखे, श्याम देशमुख पुसदेकर, अर्जुन युवनाते, योगेश ठवळी, संस्थेचे अध्यक्ष अण्णाजी कांबळे, प्रमोद कडू उपस्थित होते. यावेळी कैलाश मोरे यांचा ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ‘युवा उद्योजक’, ‘युवा भूषण’, ‘सेवा’ पुरस्कार देऊन युवकांना गौरवले. गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सप्तखंजिरी वादक तुषार सूर्यवंशी यांचा प्रबोधनपर कार्यक्रम तर गायिका प्रतीक्षा डांगे, भूषण रायबोले व प्रशांत गवई यांनी सादर केलेल्या बुद्ध-भीम गीतांनी मंत्रमुग्ध केले. संपूर्ण परिसर ‘जय भीम’च्या जयघोषाने आणि प्रेरणादायी गीतांनी दुमदुमून गेला. या कार्यक्रमाला नांदगाव पेठसह परिसरातील अनुयायी, नागरिक आणि महिलांची उपस्थिती होती.
शिरजगाव येथील महावितरणचे वीजतंत्री (लाईनमन) भूषण गाडगे यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या आठ दिवसांत त्यांची बदली करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी मोझरी येथील सहाय्यक अभियंता मनीषा चांभारे यांना निवेदन देत, ठोस कारवाई न झाल्यास कार्यालयासमोर ‘धडक आंदोलन’ करण्याचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, संबंधित लाईनमन गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यालयी राहत नसून, वीज बिघाडाच्या वेळी फोन उचलत नाहीत, बरेचदा फोन बंदच ठेवतात. त्यामुळे गावात निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी वेळेत दूर होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, गावातील विजेची कामे कंत्राटी कामगारांकडून करून घेतली जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या दहा दिवसांपासून गावात वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरू असून, मंगळवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत वीज खंडित होती. याबाबत विचारणा केली असता लाईनमनकडून उद्धट व अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. शेतकरी व नागरिकांशी अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याची तत्काळ बदली करून नवीन लाईनमनची नियुक्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा, येत्या आठ दिवसांत मोठ्या संख्येने मोझरी येथील कार्यालयावर धडक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शरद देवघरे, शरद वाघ, सुभाष मालपे, सागर वाढोनकर, महादेव अंबुलकर, देवेंद्र तायवाडे, दिनेश जौंजाळकर, संतोष बेहरे, गंगाधर मनोहर, प्रशांत डोंगरे, सुमेध भोगे, प्रकाश मेश्राम, अमरदीप वाघमारे, गंगाधर भालेराव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दोषी आढळल्यास योग्य ती प्रशासकीय कारवाई वीज पुरवठ्यातील अनियमितता व लाईनमन संदर्भातील प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली आहे. वरिष्ठांना यासंदर्भात लेखी अहवाल पाठवण्यात आला असून, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल. नागरिकांना सुरळीत वीज सेवा देणे ही आमची प्राथमिकता असून, तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मनीषा सांभारे, सहाय्यक अभियंता, महावितरण.
भगवान परशुरामांच्या विचारांचा वारसा जपावा:आमदार सुलभा खोडके यांच्या उपस्थितीत केले अभिवादन
‘भगवान परशुराम हे अन्यायाविरुद्ध लढणारे ऋषी म्हणून इतिहासात अजरामर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विचाराचा वारसा चालविण्याची जबाबदारी तरुण पिढीवर आहे,’ असे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी केले आहे. भगवान परशुराम यांची जयंती दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय्य तृतीयेला साजरी केली जाते. त्यानिमित्त येथे शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत त्यांच्यासह विधान परिषद सदस्य संजय खोडके व इतर मान्यवरही सहभागी झाले होते. आमदार खोडके पुढे म्हणाल्या, भगवान परशुरामांनी भगवान शिवशंकरांची कठोर तपश्यचर्या करुन अनेक दिव्य अस्त्रे आणि विद्या आत्मसात केल्यात. परशुराम हे '' अष्टचिरंजीवी ' पैकी ( अमर ) एक मानले जातात. त्यांचे मूळ नाव ‘ राम ' होते, परंतू भगवान शिवाने दिलेला ‘परशु ' या शस्त्रामुळे त्यांना ‘ परशुराम ' ( परशु धारण करणारे राम ) म्हटले गेले. भगवान परशुराम हे हिंदू धर्मातील एक प्रमुख दैवत असून, त्यांना भगवान विष्णुचा सहावा अवतार मानले जाते. ते माता रेणुका आणि ऋषी जमदग्नी यांचे चिरंजीव होते. ज्यांनी पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून ती आज्ञापालन करण्यासाठी कठोर पाऊल उचलले होते, अशी कथा सांगितली जाते. भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्तची शोभायात्रा ज्यावेळी राजकमल चौकात आली, त्यावेळी खोडके दाम्पत्याच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. आमदार सुलभा खोडके व आमदार संजय खोडके यांनी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेस वंदन - पूजन - नमन करीत माल्यार्पण केले. भगवान परशुराम, गोमातेच्या सन्मानार्थ काढलेल्या शोभायात्रेत सहभाग नोंदविणाऱ्या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, श्री गौरक्षण संस्था, श्री गौ सन्मान रक्तदान समिती, श्री माहेश्वरी पंचायत, श्रीरामचरितमानस परिषद, अमरावती रक्तदान समिती आणि आयोजनातील इतर समित्यांचे पदाधिकारी व सदस्ये या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले.
शहरात जागोजागी नाल्यांमध्ये अडकलेला कचरा स्वच्छ करून साचलेल्या सांडपाण्याचा निचरा व्हायलाच हवा. तसेच शहरातील मुख्य रस्ते चौकांसह अंतर्गत भागातही रस्त्यांवर कोणी अतिक्रमण करीत असेल तर ते तातडीने हटवा अन्यथा कोणाचीही गय करणार नाही, असे कडक निर्देश मनपा आयुक्तांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले. या संपूर्ण दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले की, नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत शहरातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि अतिक्रमण नियंत्रण यावर विशेष भर दिला जाईल. कोणत्याही प्रकारची हलगर्जी सहन केली जाणार नसून कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. शहरातील विविध भागांमध्ये सांडपाणी, नालेसफाई व अतिक्रमणाच्या वाढत्या समस्या लक्षात घेता मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी नुकताच सविस्तर पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नागरिकांकडून वारंवार प्राप्त होणाऱ्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.सर्वप्रथम आयुक्तांनी सामरा नगर उद्यान, सामरानगर परिसराला भेट दिली. येथे स्थानिक नागरिक सचिन थोटे यांनी वारंवार मांडलेल्या सांडपाण्याच्या समस्येची त्यांनी सखोल पाहणी केली. परिसरात सांडपाणी साचत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी तातडीने निचरा व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आदेश दिले. यानंतर सामरानगर व गजराज नगर भागात म्हशी वाल्यांकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या समस्यांची त्यांनी पाहणी केली. या अतिक्रमणामुळे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर त्वरित कारवाई करून अतिक्रमण हटवण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले. कोंडेश्वर रोडवरील पेट्रोल पंपासमोरील कच्च्या नालीची दयनीय स्थिती पाहून आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. येथे नाली पक्की करून सांडपाण्याचा सुरळीत निचरा होईल यासाठी आवश्यक ती कामे तातडीने हाती घेण्याचे आदेश देण्यात आले. तसेच मनपा उर्दू शाळा क्रमांक ११ समोरील नाल्यांची पाहणी करत त्यांनी स्वच्छतेच्या अभावामुळे निर्माण झालेल्या अडचणींची दखल घेतली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून येथे नियमित साफसफाई व दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आठवडी बाजार परिसरातील मटन मार्केट येथेही आयुक्तांनी भेट दिली. येथे अतिक्रमणामुळे नाल्यांचा प्रवाह अडखळलेला असून अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले. या ठिकाणी अतिक्रमण हटवून नाल्यांची तातडीने साफसफाई करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर झोन क्र. ४ कार्यालय, बडनेरा, गोपाल नगर टी-पॉइंट परिसराची पाहणी केली. या भागातही सांडपाणी व नाल्यांच्या समस्यांबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची आयुक्तांनी दखल घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना नियमित निरीक्षण करून समस्या कायमस्वरूपी सोडवण्याचे निर्देश देण्यात आले. या पाहणी दरम्यान नगरसेवक अजय जयस्वाल, किशोर जाधव, नगरसेविका रजनी डोंगरे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, मंगेश कडू, उद्यान अधीक्षक अजय विंचुरकर, अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे, उपअभियंता श्रीरंग तायडे, हेमंत महाजन, विवेक देशमुख, राजेश आगरकर, रवींद्र तांबेकर, ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक शारदा गुल्हाने, उद्यान निरीक्षक मुकेश खारकर, अमरावती शहर समन्वयक श्वेता बोके, अधिकारी, कर्मचारी, स्वास्थ निरीक्षक उपस्थित होते. आयुक्तांनी बेघर नागरिकांसाठी चालविण्यात येणाऱ्या ‘आधार’ निवारा केंद्राची केलेली पाहणी ही अत्यंत संवेदनशील आणि जबाबदार प्रशासनाचे उत्तम उदाहरण होय. त्यांनी केंद्रातील स्वच्छता, राहण्याची व्यवस्था, अन्नाची गुणवत्ता आणि इतर मूलभूत सुविधांची बारकाईने तपासणी करून बेघर नागरिकांच्या जीवनमानाबाबत असलेली त्यांची बांधिलकी स्पष्ट केली. फक्त पाहणी पुरते मर्यादित न राहता व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी दिलेल्या सूचनांमुळे या केंद्राच्या कार्यक्षमतेत निश्चितच सुधारणा होईल. अशा प्रकारे मानवी दृष्टिकोन ठेवून केलेले काम हे प्रशासनातील सकारात्मक बदलाचे प्रतीक असून, गरजू नागरिकांच्या जीवनात दिलासा निर्माण करणारे आहे.
वाशिंबे (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्र शासनाच्या आयसीटी योजनेअंतर्गत २३ लाख रुपयांची सुसज्ज आयसीटी लॅब उभारण्यात आली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी शैक्षणिक क्रांती ठरत आहे. या लॅबमुळे विद्यार्थ्यांना संगणक, प्रोजेक्टर आणि विविध मल्टिमीडिया साधनांच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. परिणामी, पारंपरिक शिक्षणपद्धतीला आधुनिकतेची जोड मिळाली असून, विद्यार्थ्यांना विषय अधिक समजण्यास सोपे झाले आहे. विशेष म्हणजे, दृकश्राव्य माध्यमे, अँनिमेशन आणि ध्वनी प्रभावांचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनत आहे. शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत १७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून ज्ञान मिळत असल्याने त्यांची बौद्धिक क्षमता आणि आत्मविश्वास दोन्ही वाढत आहेत. मुख्याध्यापक शरद झोळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रम राबवले जात आहेत. शिक्षणबरोबरच कलांगुणांच्या विकासासाठी नृत्य, क्रीडा, व्याख्याने होत आहेत. काळानुसार आवश्यक बदल शासनाकडून आयसीटी लॅब तसेच इतर भौतिक सोयी-सुविधा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या आहेत. स्पर्धेच्या युगात येथील विद्यार्थी स्पर्धेत टिकून राहावेत यासाठी काळानुसार बदल स्वीकारत मराठी माध्यमाबरोबरच सेमी-इंग्लिश अभ्यासक्रमही राबवण्यात आला आहे. -शरद साळुंके, मुख्याध्यापक, वाशिंबे
बार्शीमध्ये शिव-बसव जयंतीच्या मिरवणुकीत विशेष आकर्षण म्हणजे कांतारा व केरळमधील प्रसिद्ध पारंपरिक नृत्यप्रकार, अघोरी नृत्याने लक्ष वेधले. हा कलाविष्कार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात सादर झालेल्या या नृत्यप्रकारांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत ही मिरवणूक उत्साहात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. बार्शी येथे महात्मा बसवेश्वर महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती शिव-बसव जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. सोमवारी सायंकाळी सतरावा पुट्टा गणेश मंदिर येथे माजी आमदार राजेंद्र राऊत व बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या खजिनदार वर्षा ठोंबरे यांच्या हस्ते आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, बाजार समितीचे सभापती विजय गरड, पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी रोंगे, नेते भाऊसाहेब आंधळकर आदि उपस्थित होते. मुलींच्या झांज पथकाचे उत्कृष्ट सादरीकरण शिव-बसव जयंती मध्यवर्ती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या मिरवणुकीत रणगंधर्व झांज-ढोल पथक, लेझीम पथकांनी उत्साहपूर्ण सादरीकरण केले. लेझीम पथकात मुलींचाही सहभाग होता.
उन्हाची तीव्रता वाढत असून, गावोगावी पाणी टंचाई जाणवत आहे. तालुक्यातील आंधळगाव व भोसे पाणीपुरवठा योजना सुरू करणे गरजेचे आहे मात्र प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी मी काय करावे हे तरी एकदा मला सांगा? दुरुस्तीला निधी देऊन वारंवार पाठपुरावा करून योजना कार्यान्वित होत नसेल तर प्रशासन करतंय तरी काय ?अशा शब्दात आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला खडे बोल सुनावले. ते मंगळवेढा तालुक्यातील भोसे व आंधळगाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात घेतलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती दीपाली ताड ,उपसभापती अर्जुन मल्लाळे, तहसीलदार मदन जाधव,गटविकास अधिकारी विजयकुमार देशमुख ,महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय शिंदे,पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे,मोहिनी गणपाटील,जयश्री शिंदे,सुरेश कांबळे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर,करुणा शिवशरण,संगीता दुधाळ ,पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेश ढोणे ,नितीन पाटील, शिखर समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र खताळ,जनार्दन शिवशरण, आनंद ताड यांचे सह विविध गावचे सरपंच ग्रामसेवक उपस्थित होते. हंगामी पाण्याची मागणी होत असल्याने असल्याने योजना बारमाही कार्यान्वित राहणे मुश्कील आहे,यासाठी उपाययोजनांची गरज असून वीज ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई आहे तेथील ग्रामपंचायतींनी तात्काळ टँकर मागणीचे प्रस्ताव सादर करावेत सध्या टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असल्याने प्रस्तावातील त्रुटी असल्यास त्याची पूर्तता करण्यास वेळ जाणार असल्याने हे अधिकार प्रांत अधिकाऱ्यांना देण्याबाबत चर्चा करणार असल्याचेही आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचा आढावा ऐकून घेतल्यानंतर बोलताना आ.समाधान आवताडे म्हणाले की योजनेत उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्यामुळे ही योजना चालवणे मुश्कील आहे. या योजना बारमाही चालल्या तरच खर्चाचा उत्पन्नाचा ताळमेळ लागणार आहे. मात्र या योजनेतील गावे उन्हाळ्यामध्ये दोन ते तीन महिन्यासाठीच पाण्याची मागणी करत असल्यामुळे इतर आठ ते दहा महिने योजना बंद राहते त्यामुळे विज बिल मोडतोड खर्च याचा ताळमेळ लागत नसून, ही योजना सुरू करून ज्यावेळेस गावांना पाणी नको आहे. त्यावेळेस एमआयडीसी असो की अन्य उद्योगांना पाणी देऊन त्यातून या योजनेचा खर्च भागवण्याचे नियोजन करावे लागणार आहे. बिलाला तोडगा काढण्यासाठी सोलर बसवून त्याद्वारे ही योजना कार्यान्वित करण्याची अंमलबजावणी केली असून सोलर बसविण्याचे काम सुरू असल्याचेही आ.समाधान आवताडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. या बैठकीत बोलताना पाणीपुरवठा अधिकारी काटकर म्हणाले ,योजना सुरू करण्यासाठी निधीची आवश्यकता असून योजनेचे वीज बिल आणि पाणीपट्टी थकीत आहे त्यामुळे थक पाणीपट्टी अभावी जलसंपदा विभागाने ही योजना सिल केली आहे या योजनेची १ कोटी ३० लाख पाणीपट्टी थकीत आहे तर १४ लाख रुपये ग्रामपंचायतीकडून येणे आहे ३ कोटी १२ लाख विज बिल थकीत असून हे विज बिल माफ करावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंढरपूर शहरातील जिजामाता उद्यानाचे सोमवारी वादग्रस्त पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. परंतु उद्यानाचे काम अर्धवट असल्याने मंगळवारी उद्यान बंद ठेवण्यात आले. उद्यान सुरू झाल्याचे समजल्याने मंगळवारी दुपारनंतर आलेल्या शेकडो बालक आणि नागरिकांनी उद्यानाच्या गेटवर गर्दी केली होती, परंतु उद्यानाला कुलूप पाहू त्यांची निराशा झाली. शेवटी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गेटचे कुलूप तोडून मुलांना प्रवेश दिला. त्यानंतर शेकडो मुले आणि नागरिकांनी उद्यानात मनसोक्त आनंद घेतला. शहरातील जिजामाता उद्यानाचे नूतनीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू, मात्र अद्यापही ते पूर्ण झालेले नाही.उद्यानाच्या कामाच्या गुणवत्तेवरून मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत.तरीही सोमवारी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांना कसलीही कल्पना न देता, भाजप नगरसेवकांच्या पुढाकाराने आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. सोमवारीच तीर्थक्षेत्र विकास आघाडी, काँग्रेस, संभाजी ब्रिगेडसह अनेक सामाजिक संघटनांनी काम अपूर्ण आणि निकृष्ट असताना उद्घाटन करण्यास विरोध केला होता, तरीही उद्घाटन करण्यात आले. उद्यान सुरू झाल्याचे समजल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून उद्यानाच्या प्रवेशद्वारावर लहान मुले, जेष्ठ नागरिकांची गर्दी झाली होती. परंतु उद्यान कुलूपबंद पाहून त्यांची निराशा झाली. अखेरीस सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काळे आणि इतर कार्यकर्त्यांनी कुलूप तोडून सर्वांना उद्यानात प्रवेश दिला. त्यानंतर सर्वांनी उद्यानात मौज केली. परंतु कारंजे आणि इतर अनेक कामे अपूर्ण असल्याने गैरसोयीचा सामना करावा लागला. साडेतीन कोटी रुपये खर्च होऊनही अडचण, अपेक्षांवर फेरले पाणी उद्यानाचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्याचा घाट घातला गेला. आमदार आणि माजी आमदारांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम होतो आणि दुसऱ्या दिवशी उद्यान बंद ठेवावे लागते, हे चुकीचे आहे. साडे तीन कोटींचा खर्च करूनही अर्धवट, निकृष्ट काम होत असेल तर नागरिकाच्या अपेक्षांवर पाणी टाकण्याचा हा प्रकार आहे. - राजाभाऊ उराडे, काँग्रेस कार्यकर्ते जिजामाता उद्यानासमोर नागरिक व बच्चे कंपनी जमल्यानंतर कुलूप तोडून प्रवेश करण्यात आला.
दैवी शक्तीचा दावा करत महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपांमध्ये अडकलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या चौकशीत नवा वळण आले आहे. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू असलेल्या चौकशीदरम्यान अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने एकच खळबळ उडाली. छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने पोलिसांना तातडीने वैद्यकीय मदत बोलवावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडून खरातची कसून चौकशी सुरू आहे. एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर दुसऱ्या प्रकरणात त्याला पोलिस कोठडीत घेऊन दररोज अनेक तास चौकशी केली जात आहे. मात्र मंगळवारी चौकशीदरम्यान त्याची तब्येत अचानक खालावली. त्याला ऑक्सिजन लावण्यात आला आणि तातडीने कार्डियाक अॅम्ब्युलन्स मागवून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. खरातच्या प्रकृतीत अचानक बिघाड होण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याच्या वकिलांनी न्यायालयात वैद्यकीय तपासणीबाबत महत्त्वाची मागणी केली होती. खरातच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्याला सतत डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले होते. औषधांनी फारसा फायदा होत नसल्याने त्याला न्यूरोसर्जनकडे तपासणीसाठी नेण्याची विनंती करण्यात आली होती. या मागणीनंतर काही दिवसांतच त्याची तब्येत बिघडल्याने संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात एसआयटीकडून चौकशीचा वेग वाढवण्यात आला आहे. खरातशी संबंधित डॉक्टर आणि इतर व्यक्तींची चौकशी सुरू असून नाशिकमधील एका बड्या हॉटेल व्यावसायिकालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्याची सहा तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत आर्थिक व्यवहार, जमीन व्यवहार आणि इतर संबंधांबाबत माहिती घेतल्याचे समजते. चौकशीनंतर त्या व्यावसायिकाला रात्री उशिरा सोडण्यात आले. अशोक खरातच्या पोलिस कोठडीची मुदत आता गुरुवारी संपणार आहे. त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार असून एसआयटीकडून पुढील कारवाई काय होणार, याकडे लक्ष लागले आहे. नव्या माहितीच्या आधारे पुन्हा पोलिस कोठडी मागितली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणातील तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचेही आरोप याच प्रकरणात सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानेही खरातविरोधात गंभीर आरोप केले आहेत. कळमण येथील शेतकरी राजाराम बनसोडे यांनी 11 एकर जमीन दीड कोटी रुपयांना घेण्याचे आश्वासन देऊन केवळ 50 लाख रुपये दिल्याचा आरोप केला आहे. उर्वरित रक्कम मागितल्यावर जादूटोण्याची धमकी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणी खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून पोलिसांकडे तक्रारही देण्यात आली आहे.
राम कथा आपल्याला शौर्य, वचनबद्धता, भक्ती व बंधुप्रेम शिकवते. त्यामुळे ती कुटुंबासह श्रवण करणे महत्त्वाचे आहे. आपला भाऊ भरत सारखा आपल्याला अपेक्षित असेल तर आपण स्वतः आधी राम आहोत का हे तपासले पाहिजे, असे प्रतिपादन रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांनी सोमवारी केले. यावेळी कथेत राम-भरत भेट आणि प्रभू रामाने शबरीची घेतलेली भेट या प्रसंगांचे वर्णन करताना स्वतः डॉ.विश्वास यांच्यासह भाविकांचेही डोळे पाणवले. उपस्थितांनाही गहिवरून आले. माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मृतीनिमित्त येथील काका ट्रस्ट व जगताप परिवाराचे वतीने आयोजित ‘अपने अपने राम’ या रामकथा प्रवचनात दुसरे पुष्प डॉ. कुमार विश्वास यांनी गुंफले. यावेळी बोलताना त्यांनी राम कथा सर्वांना माहीत आहे, परंतु ती प्रत्येकाच्या जीवनाशी कशी निगडित आहे हे जाणून घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशीच्या कथेची सुरवातीला बडीसाजन ओसवाल संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, मंदारबुवा रामदासी, डॉ. हर्षवर्धन तमनर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, धनश्री विखे, नानासाहेब फाटके, अनिल पोखरणा, मोहनलाल मानधना आदींच्या हस्ते श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान मूर्तींचे पूजन झाले. रामकथेचे विवेचन ऐकण्यासाठी शहरासह जिल्ह्यातून हजारो नागरिकांनी अलोट गर्दी केल्याने एक लाख स्क्वेअर फुटाचा भव्य मंडपही कमी पडला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप व आ.संग्राम जगताप यांनी स्वागत केले. डॉ.विश्वास म्हणाले, श्रीरामांना वनवासात धाडणारी माता कैकयी हिला सर्वांनी दोष दिला असला तरी खरे तर तिचे सर्वांनी आभार मानले पाहिजे. ती खलनायिका नाही. महालातील रामाला तिने सर्व सामान्यांचा राम केल्याने तिचे आभार मानले पाहिजे. तिच्यामुळे जगतकल्याण झाले. रामायणात कोणीही खलनायक नाही. कैकयी, रावण, शूरपणखा ही व्यक्तिमत्त्व त्यांच्या कर्मातून जीवनात काय चांगले व काय वाईट याचे दाखले देतात. रावण हा अनाचार व अहंकाराचे प्रतीक आहे, शूरपणखा वासनेचे प्रतीक तर शबरी वात्सल्य दर्शवते, बिभीषण शरणागताचा उद्धार दर्शवतो, सुग्रीव मैत्रीची कर्तव्याची जाणीव देतो तर हनुमंत भक्तीची ताकद दाखवतो. या सर्वांचे परमेश्वरा प्रति असलेली भक्ती रामायणातून स्पष्ट होते. डॉ. विश्वास यांनी राम कथेचे अनुषंगाने दिलेले जीवन दाखले टाळ्यांची दाद मिळवून गेले. मुघल आक्रमकांनी रामाचे मंदिर तोडले तरी आमच्या हृदयातील राम तुम्ही तोडू शकत नाही. मृत्यूचे भय दूर करण्याचे काम राम कथा करते. अरुणकाका शरीराने जरी अस्तित्वात नसले तरी त्यांच्या सामाजिक कामाचे यश सर्वांच्या मनात आहे. ्र प्रारंभी देशात गाजलेल्या गायकांनी सादर केलेल्या भजनांमध्ये उपस्थित भाविक तल्लीन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा दाखला डॉ. विश्वास यांनी राम-शबरी भेटीच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांनाही जंगलात राहणाऱ्या गरीब महिलेने युद्धनीतीचा संदेश दिल्याचा दाखला दिला. युद्ध मोहिमेवरून परतताना छत्रपती जंगलात राहणाऱ्या महिलेच्या कुटीत सैनिकांसह राहिले होते. कशा पद्धतीने शत्रूवर आक्रमण केले तर तुमच्या राजाला यश मिळेल याचा सल्ला तिने दिल्यावर ते ऐकून छत्रपतींनी त्यांची युद्धनीती बदलली व गुरिल्ला (गनिमी कावा) अंगीकारून शत्रूला जेरीस आणले व दिल्लीतील उंदराला औरंगजेबला महाराष्ट्रात आणून कुत्ते की मौत दिली, असेही डॉ. कुमार विश्वास यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
आमदार आणि खासदारांनी एकदा शपथ घेतली की त्यांना आयुष्यभर पेन्शन मिळते, मात्र ३०-३० वर्षे प्रामाणिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारली जाते, ही मोठी शोकांतिका आहे. सध्या निवृत्त कर्मचाऱ्यांना केवळ १५०० ते १८०० रुपये पेन्शन मिळतेय. वाढत्या महागाईत ही रक्कम चहापाण्यासाठीही पुरणार नाही, मग घरखर्च कसा चालवायचा? असा सवाल माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट यांनी उपस्थित केला. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात जामखेड तालुक्यातील महसूल, आरोग्य, शिक्षण आणि इतर विभागांतील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या आंदोलनामुळे तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून शाळा आणि सरकारी कार्यालयांत शुकशुकाट होता. सकाळी १० वाजता तालुक्यातील माध्यमिक शिक्षक ल. ना. होशिंग विद्यालयात एकत्र जमले. तेथून 'एकच मिशन, जुनी पेन्शन'च्या घोषणा देत सर्व कर्मचारी तहसील कार्यालयावर धडकले. समन्वय समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या संपा मुळे तालुक्यातील महसूल, कृषी, आरोग्य आणि शिक्षण विभागाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. भरती बंदी आणि कामाचा ताण शिक्षकेतर संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी यावेळी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या. एकीकडे जुनी पेन्शन नाही आणि दुसरीकडे नवीन कर्मचारी भरतीही बंद आहे. यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करावे आणि रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात माजी अध्यक्ष पी. टी. गायकवाड, संतोष पवार, झाकीर शेख, भागवत चांगुणे, अमोल भोंडवे, हनुमंत वराट, भाऊसाहेब इथापे, रामेश्वर धुमाळ, अर्जुन रासकर, सुनील घाडगे, मयूर भोसले, विशाल पोले, आदित्य देशमुख, दिनकर सरगर, बुवासाहेब दहिकर, बाबासाहेब धनवडे, नंदकुमार गव्हाणे आदी सहभागी झाले. मागण्या मान्य झाल्याशिवाय खुर्चीवर बसणार नाही एकच मिशन जुनी पेन्शन यासह दीर्घकाळ आंदोलन, संप आणि निवेदनांनंतरही शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी आता निर्णायक लढ्याची तयारी सुरू केली आहे. आता मागण्या मान्य झाल्याशिवाय खुर्चीवर बसणार नाही, असा निर्धार समन्वय समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
शेवगाव तहसीलमध्ये अस्वच्छतेचा रामभरोसे कारभार:कर्मचाऱ्यांकडूनच गुटख्याची रंगरंगोटी
शेवगाव तहसील कार्यालयात सध्या स्वच्छतेच्या नियमांची ऐशीतैशी होताना दिसत आहे. ज्या प्रशासनाने 'स्वच्छ भारत अभियान' राबवायचे, त्याच कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे, दिव्यांगांसाठी बनवलेला रॅम्प कचराकुंडी बनला असून, कार्यालयातील भिंती गुटखा-माव्याच्या पिचकाऱ्यांनी लालभडक झाल्या आहेत. या अस्वच्छतेमागे बाहेरील व्यक्तींपेक्षा स्वतः कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रवेशद्वाराजवळील रॅम्पवर प्लास्टिक पिशव्या, रिकाम्या बाटल्या आणि कागदाचे तुकडे आदींचा साचला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. एकीकडे शासन 'दिव्यांग-स्नेही' धोरणाच्या गप्पा मारते, तर दुसरीकडे त्याच दिव्यांगांच्या मार्गात कचऱ्याचे अडथळे उभे केले जात आहेत. तहसील कार्यालयात रक्षकच भक्षक झाले आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया आदर्श गाव वाघोली येथील उमेश भालसिंग यांनी दिली. त्यांच्या दाव्यानुसार, काही अधिकारी स्वतःच्या दालनातच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. इतकेच नाही तर, बाहेर जात असशील तर माझ्यासाठीही पान-मावा घेऊन ये, अशा सूचना काही अधिकाऱ्यांकडून दिल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.यापूर्वी तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या असीमा मित्तल यांनी अस्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच साफसफाई करून घेण्याची शिक्षा दिली होती. त्यांच्या या धाकामुळे कार्यालयाचा परिसर चकाचक राहत असे. मात्र, सध्याच्या प्रशासकीय सुस्तपणामुळे शिस्त कोलमडली असून, पुन्हा एकदा अशाच कठोर कारवाईची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि कचरा टाकणे हा गुन्हा आहे, हे नागरिकांना शिकवणारे अधिकारीच पिचकाऱ्या मारत असतील, तर न्याय कुणाकडे मागायचा? सध्याच्या तहसीलदारांनी तातडीने याकडे लक्ष देऊन कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी उमेश भालसिंग यांनी केली आहे.
अहिल्यानगर वाढत्या उन्हाची दाहकता लक्षात घेता कामरगाव (ता. नगर) ग्रामस्थांनी प्रशासकीय मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून वन्यप्राण्यांसाठी ५ पाणवठे तयार केले. या स्तुत्य उपक्रमाची नगरचे तहसीलदार संजय शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. केवळ पाहणीच नाही, तर स्वतः टँकरमधून पाणी सोडून त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला व तालुक्यातील इतर संस्थांनीही याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. कामरगाव परिसरात वनविभागाचे सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र असून, येथे हरीण, मोर, ससे, रानडुक्कर आणि तरस यांसारखे वन्यप्राणी आढळतात. या मुक्या जीवांची तहान भागवण्यासाठी माजी सरपंच तुकाराम कातोरे व वन्यप्राणी सेवा समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी लोकसहभागातून डोंगर रांगेच्या पायथ्याशी नाविन्यपूर्ण पाणवठे उभारले आहेत. कामरगावचा हा उपक्रम पाहून तहसीलदार संजय शिंदे, नायब तहसीलदार अभिजित वांढेकर आणि वरिष्ठ लिपिक सुहास लांडगे यांनी एका महिन्याचा टँकरचा खर्च स्वखर्चातून करण्याची घोषणा केली. यामुळे वन्यप्राणी समितीला मोठे पाठबळ मिळाले आहे. या कामासाठी सरकारी निधी घेतला जात नाही. गावात होणारे वाढदिवस, लग्न समारंभ, वर्षश्राद्ध किंवा बारसे यांसारख्या कार्यक्रमांतील अनावश्यक खर्च वाचवून ग्रामस्थ या समितीला मदत करतात. यातूनच टँकरद्वारे पाणी सोडण्याचे काम सुरू आहे. कामरगाव येथे लोकसहभागातून होत असलेले काम पाहून आनंद झाला. हे आपले स्वतःचे काम आहे या भावनेतून लोक मदत करत आहेत. सरकारच्या मदतीची वाट न पाहता सामाजिक उपक्रमांसाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहन तहसीलदार संजय शिंदे यांनी केले. यावेळी वन्यप्राणी सेवा समितीचे अध्यक्ष तुकाराम कातोरे, कार्याध्यक्ष राजेंद्र शिंदे, रविराज साठे, प्रदीप साठे, अंबादास रोहकले, सुखदेव वेताळ, ग्राम महसूल अधिकारी संतोष मांडगे, अनिल ठोकळ आदी उपस्थित होते. असे आहेत हायटेक पाणवठे रचना : जेसीबीच्या साह्याने २५ फूट लांब, २४ फूट रुंद आणि ४ फूट खोल खड्डा. पिचिंग : तळाला शेततळ्याचा जाड कागद अंथरून त्यावर दगडांची पिचिंग केली आहे. फायदा : यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही, कागद चोरीला जात नाही आणि पाणी पिताना एखादा पक्षी किंवा प्राणी पडला तर त्याला दगडांच्या आधाराने बाहेर पडता येते. पाणवठ्यात टँकरने पाणी सोडताना कामरगाव ग्रामस्थ.
पाणीटंचाईच्या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्क राहून जबाबदारीने काम करावे. लोकप्रतिनिधींच्या सूचनेची वाट न पाहता टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव तातडीने सादर करा. नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे, यात कोणतीही दिरंगाई किंवा कामात शिथिलता खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रशासनाला सुनावले. पाथर्डी तहसील कार्यालयात शेवगाव व पाथर्डी तालुक्यांच्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांत प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व सरपंच उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी कठोर पवित्रा घेतला आहे. ज्या तलावांत पाणीसाठा आहे, तेथील वीजपंप जप्त करून अनधिकृत जोडण्या कापण्याचे आदेश वीज वितरण कंपनीला दिले आहेत. विशेषतः कुत्तरवाडी तलावातील अनधिकृत पाणी उपशाची गंभीर दखल घेत त्यांनी जलसंधारण विभाग आणि महावितरणला तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. टँकर भरताना आणि रिकामे करतानाचे तारीख व वेळेसह फोटो सादर करावे लागणार. मी स्वतः या नोंदी तपासणार असून त्यात त्रुटी आढळल्यास गय करणार नाही. पिण्याच्या पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी आरोग्य विभागाने दररोज नमुने घ्यावेत. गावातील टंचाई परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तलाठी-ग्रामसेवकांनी मुख्यालयात थांबून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना टँकर मंजुरीसाठी विलंब होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे प्रस्तावांत तांत्रिक दिरंगाई झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
वारकऱ्यांचे व्यासपीठ हे संत विचारांचे व्यासपीठ आहे. मला नेहमीच वेगळी ऊर्जा मिळते. या ठिकाणी राजकारण नको, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. श्रीक्षेत्र तरडे खुर्द (ता. धरणगाव) येथे वारकरी परंपरेच्या भक्तिमय वातावरणात वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षा प्रदान सोहळा उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महंत श्रीकांतदास महाराज होते. संत नामदेव खालसा आखाड्याचे प्रमुख महामंडलेश्वर अनंतदास महाराज यांच्या हस्ते बाबूलाल पाटील यांना महंत पदवी व वारकरी गुणीरत्न पुरस्कार देण्यात आला. गुलाबराव पाटील म्हणाले, संतांचे विचार केवळ ऐकण्यासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी आहेत. याच विचारांतून माणूस आणि समाज घडतो. वारकरी संप्रदाय ही आपली संस्कृती आणि ओळख असून, तिचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. तरडे सारख्या पवित्र भूमीत परमार्थाचे जे कार्य सुरू आहे, ते समाजासाठी प्रेरणादायी आहे. संतांच्या मार्गावर चालणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करतो. कार्यक्रमानंतर आमरस-पुरणपोळीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला आणि पसायदानाने सांगता झाली. यशस्वितेसाठी तरडे येथील तरुण मित्रमंडळ, संत तानसेन भजनी मंडळ व महिला मंडळाने परिश्रम घेतले. वारकऱ्यांच्या व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील. कार्यक्रमास या संत-महंतांची होती उपस्थिती कार्यक्रमास महंत प्रणवगिरी बाबाजी, महंत नागेशानंद, महंत योगी ऋषिनाथ, सौरभ महाराज, नवनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, गजानन वरसाडेकर, गोविंद महाराज पाचोरा, रूपचंद बाबा, कौतिक महाराज लोणीकर, स्वयंभू त्रिवेणेश्वर महादेव संस्थानाधिपती निमगाव,कृष्णा महाराज, प्रा. सी. एस. पाटील, रमेश महाराज, नाशिक येथील विविध संत-महंत मोठ्या संख्येने आले होते. सुमारे दीड तास श्रोत्यांमध्ये रंगले पालकमंत्री संत नामदेव खालसा आखाड्याच्या वतीने गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सुमारे दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात गुलाबराव पाटील हे पूर्ण वेळ श्रोत्यांमध्ये बसून सहभागी झाले होते. व्यासपीठावर केवळ वारकरी, साधूसंत व कीर्तनकार मंडळी विराजमान होती.
जामनेर आगारात जागा नसल्याने एस.टी. महामंडळाला चार्जिंग स्टेशन उभारणे शक्य झाले नाही. यामुळे मात्र इतर डेपोतील जुन्या झालेल्या खटारा गाड्यांमधून प्रवास करण्याची वेळ जामनेरातील प्रवाशांवर आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून बसपोर्टचे काम रखडले असून जामनेर बस स्टॅन्डला विविध समस्यांचा विळखा पडला आहे. गेल्या काही वर्षात अनेक जीर्ण झालेल्या बस भंगारात काढाव्या लागल्या आहेत. यात जामनेर आगारातीलही नऊ बसेस भंगारात निघाल्या आसून नवीन ईव्ही बसेस मिळत असल्या तरी जामनेर एसटी डेपोत चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी जागा नसल्याने जुन्या झालेल्या खटारा बसेसमधून प्रवास करण्याची वेळ जामनेरातील प्रवाशांवर आली आहे. जामनेर एसटी डेपोसह आगाराची मिळून तब्बल तीन एकर जागा आहे. २०१७ साली शासनातर्फे १४ कोटी रुपये निधी मंजूर करून एअरपोर्टच्या धर्तीवर बस पोर्ट निर्मितीसाठी मंजुरी मिळाली आहे. मात्र तेव्हापासून बस्पोर्टचे काम अर्धवट अवस्थेत पडलेले आहे. बस स्थानकातील पंखे बंद असल्याने प्रवाशांना उकाडा सहन करावा लागत आहे. तर सीसीटीव्ही नसल्याने चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या आठ वर्षांपासून काम रखडलेल्या जामनेर बसपोर्टमध्ये प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्याचबरोबर स्वच्छतागृह मधोमध बांधून ठेवल्याने प्रवासी बसण्याच्या जागी अनेक वेळा दुर्गंधी येते. अशा एक ना अनेक समस्यांनी जामनेरचे बस पोर्ट समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. स्वच्छतागृहाची गैरसोय ^वाढत्या चोरांचे प्रमाण पाहता सीसीटीव्ही बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नवीन पंखे मागवले आहे. काही लवकरच दुरुस्त करून घेऊ. चार्जिंग स्टेशनसाठी आवश्यक तेवढी जागा नसल्याने चार्जिंग स्टेशन उभारणे शक्य नाही. त्यामुळे आहे त्याच बसेसवर प्रवासी वाहतूक करावी लागत आहे. - दिनेश नाईक, डेपो मॅनेजर, जामनेर.
तांदलवाडी परिसरात केळी हे मुख्य पीक आहे. त्यामुळे वर्षभर निर्यातक्षम उत्पादनावर शेतकऱ्यांवर भर असतो. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच उष्णता वाढून तापमान चाळिशीपार गेले आहे. यामुळे केळीचे पीक जोपासताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. उष्णतेचा कापणीवर असलेल्या केळी बागांवर परिणाम होऊ नये म्हणून शेतकरी विविध उपाययोजना करताना दिसत आहेत. तापमान वाढीमुळे केळी झाडाची पाने कोरडी पडणे, घड निसटणे, पाने करपणे, प्रखर सूर्यकिरणांमुळे घड खराब होऊन काळे पडणे, पिकाची वाढ खुंटणे असे प्रकार होतात. यंदा एप्रिलपासून तापमान चाळिशीपार गेले. आताही एप्रिलमध्ये तापमानाचे चटके सहन करावे लागत आहेत. पुढेही मे हीटचा तडाखा सहन करावा लागेल. यामुळे केळी पीक वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. बागेत उष्ण हवा जाऊ नये म्हणून बांधावर साडी किंवा हिरव्या नेटचा वापर करून बागेच्या चारही सीमा बंद करणे, धैंचा, निरगुड, नेपियर गवत (हत्ती गवत) व गुरांचा घास आडोसा म्हणून लावणे, केळीची पत्ती वापरून घड झाकणे, घडांसाठी स्कर्टिंग बॅगचा वापर करताना दिसतात. परिसरात पूर्वी मृग बाग आणि कांदेबाग अशी केळी लागवड व्हायची. मात्र, आता वर्षभर लागवड आणि उत्पादनामुळे केळीला वर्षभर बाजारपेठ मिळते. यामुळे मागील वर्षी जूनमध्ये केळी लागवड झालेल्या बागा आता निसवणीवर तर काही परिपक्व होत आहेत. त्यांना उन्हाची झळ बसू नये म्हणून तांदलवाडी, बलवाडी, मांगलवाडी, दसनूर, सिंगत, सुनोदा, उधळी परिसरातील शेतकरी जिवापाड मेहनत घेतांना दिसत आहेत.
दिंडोरी व पेठ तालुक्यातील जनतेच्या प्रलंबित मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने दखल न घेतल्याने भूमिपुत्र एल्गार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर कनोजे यांच्या नेतृत्त्वाखाली नाशिक - पेठ रस्त्यावरील गोळशी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. नायब तहसीलदार चैताली दराडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विविध मागण्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता. आंदोलनात उत्तमराव चौरे, संतोष भोई, सरपंच तुकाराम चोथवे, लक्ष्मण जाधव, छगन गवळी, नामदेव बोडके यांसह कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. {तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करणे { ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांरी मुख्यालयी राहत नाही त्यांच्यावर कार्यवाही करणे { तात्काळ रेशनकार्ड उपलब्ध करणे { नाशिक पेठ रस्त्यावरील टोलनाक्यातून स्थानिकांना सूट मिळणे { तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेता रस्त्यांची कामे सुरू करणे { विविध दाखले मुदतीत मिळणे, आदी मागण्या मांडण्यात आल्या.
साल्हेर परिसरातील पायरपाडा ते भिकारसोंडा या ५ किमी रस्त्याची अवस्था पाहिल्यावर ‘विकास' नेमका कुणाचा झाला, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामामुळे आदिवासी बांधवांचे हाल होत असून, आता त्यांच्या संयमाचा बांध सुटला आहे. निधी येतो, पण मुरतो कुठे?’ असा थेट सवाल करत ग्रामस्थांनी साल्हेर ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढण्याचा पवित्रा घेतला आहे. पायरपाडा व भिकारसोंडा या वस्त्यांना जोडणारा हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावरील खडी उघडी पडल्याने दुचाकीस्वारांचे अपघात नित्यनेमाचे झाले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याचे रूपांतर चिखलाच्या मैदानात होते. सर्वात भयावह परिस्थिती रुग्ण आणि गरोदर मातांची होते, अँब्युलन्स नसल्याने गर्भवती महिलेला खासगी वाहनाने हलवावे लागले रविवारी रात्री सुमारे १०:०० वाजता एक गंभीर प्रसंग घडला. भिकार सोंडा येथील एका गर्भवती महिलेला अचानक तीव्र वेदना सुरू झाल्याने तिला तातडीने दवाखान्यात नेण्याची गरज निर्माण झाली. मात्र, साल्हेर ते भिकार सोंडा दरम्यानचा रस्ता खराब असल्यामुळे वाहतुकीत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. संबंधित रुग्णवाहिका दुसऱ्या रुग्णाला घेऊन कळवणकडे गेली असल्याने ती वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे महिलेला होणाऱ्या त्रासामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या कठीण परिस्थितीत ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तत्काळ खासगी वाहनाची व्यवस्था केली आणि खराब रस्त्याचा सामना करत त्या गर्भवती महिलेला दळखाने येथील दवाखान्यात सुरक्षितपणे दाखल केले. या घटनेमुळे खराब रस्ते आणि अपुरी वैद्यकीय सुविधा यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवताना ग्रामस्थांना अक्षरशः जीव मुठीत धरून कसरत करावी लागते. गरोदर माता यांना साल्हेर येथे उपचारासाठी नेत असतांना रस्त्यामुळे जीवघेण्या कळा सोसाव्या लागतात. नेत्यांना आता गावबंदीची करण्याची वेळ ^प्रशासन आदिवासींच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. राज्य शासनाकडून निधी विकासकामांसाठी येतो की केवळ कंत्राटदारांना पोसण्यासाठी? हे सर्वसामान्य नागरिकांना समजत नाही. निवडणुकीपुरता चेहरा दाखवणाऱ्या नेत्यांना आता गावबंदी करण्याची वेळ आली आहे. - सुकलाल शिंदे, ग्रामस्थ, पायरपाडा
मोबाईलचा अतिरेक लहान मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव निर्माण करतो. मानसिक तणाव वाढतो. सोशल आयसोलेशन होते. शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. ‘मोबाईल ही सोय आहे, गरज होऊ नये,’ अशी जाणीव पालक व शिक्षकांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. मुलांमधील मोबाईलचे व्यसन कमी करण्यासाठी पालकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे मत पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांनी व्यक्त केले. अशोका पब्लिक स्कूलमध्ये पालक मेळावा व ग्रॅज्युएशन डे कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष संजयकुमार चव्हाण होते. देशमुख म्हणाले, बालवयात योग्य दिशा देणे गरजेचे आहे, सुसंस्कार, शिस्त, वाचनाची सवय, प्रत्यक्ष अनुभव यातून व्यक्तिमत्त्व घडते, लहान वयात तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर करावा. अभ्यास व संस्कारांवर लक्ष केंद्रित करावे, असे सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आयएएस श्रेया एक्झाममध्ये यश मिळवले. वेदिका ज्ञानेश्वर जाधव २८६, अनया प्रसाद काळे २८२ गुण मिळवले. सूत्रसंचालन वंदना मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सविता राठोड, प्रियंका चिंचणे, स्वाती हिवाळे, धनश्री काकडे, अश्विनी चंदेल, आकांक्षा खरात, शितल कुटारे, प्रणिता दळवी, ज्योती शहाणे यांनी सहकार्य केले.यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा केला मान्यवरांनी सत्कार या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वार्षिक पारितोषिक वितरणही करण्यात आले. प्री-प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ विशेष आकर्षण ठरला. प्री-प्रायमरीतून प्राथमिक स्तरात प्रवेश देत शैक्षणिक पायाला भक्कम आधार देण्यावर भर देण्यात आला.
पैठण येथील ३१० एकर क्षेत्रातील संत ज्ञानेश्वर उद्यान ‘दिव्य मराठी’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पुन्हा सुरू झाले आहे. तरी सध्या उद्यानातील व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दररोज हजारो पर्यटक उद्यानाला भेट देत असताना, मूलभूत सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे उद्यानाची अवस्था चिंताजनक बनत चालली आहे. येथे लहान-मोठ्या मेंटेनन्सच्या कामांसाठीही निधी मिळत नसल्याने स्थानिक अधिकारी हतबल झाले आहेत. उद्यानातील संगीत कारंज्याचा करार संपुष्टात आल्याने ते बंद पडण्याच्या मार्गावर आहे. पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तसेच साफसफाई, झुडुपे काढणे यांसारखी नियमित कामेही रखडली आहेत. यामुळे एकेकाळी पैठणचा ‘हिरवा श्वास’ ठरलेले हे उद्यान पुन्हा बकाल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाटबंधारे विभागाच्या ताब्यात असलेल्या या उद्यानाकडे संभाजीनगर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उद्यान विकास समितीने केला आहे. ^ उद्यानातील काही बाबी वरिष्ठांना कळविल्या आहेत. लवकरच इतर कामे सुरू होतील. स्वच्छता, दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य दिले जाईल. - प्रशांत संत, कार्यकारी अभियंता आमदार विलास भुमरे यांनी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. नवीन टेंडर प्रक्रियेनंतर कामे सुरू होतील, असा दावा करण्यात येत आहे. उद्यान विकास समितीचे प्रा. संतोष गव्हाणे, रमेश शेळके, बाळू आहेर, संतोष गोबरे, बजरंग काळे, शिवाजी गाडे, पवन लोहिया, रमेश लिंबोरे आदींनी उद्यानाची पाहणी केली. तातडीने साफसफाई, संगीत कारंजा दुरुस्त करण्याची मागणी केली.
तालुक्यातील तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे कर्मचारी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे तालुक्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. या संपाचा परिणाम केवळ शासकीय कार्यालयांपुरता मर्यादित राहिला नाही. तो सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, विविध योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे, सुधारित पेन्शन योजनेची अंमलबजावणी करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. ७/१२ उतारे, फेरफार नोंदी, जमीन मोजणी, वारस नोंदणी, खरेदी-विक्री व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे या सर्व प्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे व्यवहार, बँक कर्ज प्रक्रिया आणि इतर आर्थिक व्यवहार अडचणीत आले आहेत. याशिवाय प्रलंबित अर्जांवर सुनावण्या होत नसल्यामुळे अनेक प्रकरणे रखडली आहेत. जमिनीशी संबंधित कामांवरही झाला मोठा परिणाम
लासूर (ता. वैजापूर) येथील मराठवाड्याची कुलस्वामिनी श्री देवी दाक्षायणी मातेच्या यात्रोत्सवात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रविवारी दाक्षायणी मंदिरात सुमारे ७५ हजारांहून अधिक भाविकांनी मनोभावे देवीची पूजा करून आशीर्वाद घेतले. आज दिवसभर दर्शनासाठी मंदिरात भाविकांच्या रांगा होत्या. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शन घेतले. आखाजीच्या मुहूर्तावर रविवारी सायंकाळी वैजापूरचे आमदार तथा शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद रमेश बोरनारे यांनीही विशेष उपस्थिती लावली. त्यांनी दाक्षायणी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी मंदिराच्या व्यवस्थापनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पारदर्शक कामकाजाचे कौतुक केले. मंदिराच्या व्हिजिट पुस्तिकेत नोंद केली. या वेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे यांनी बोरनारे सरांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांनी अक्षय्य तृतीयेच्या आगमनाबद्दल आमदार रमेश बोरनारे यांना भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. रविवारी (१९ एप्रिल )अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दाक्षायणी देवीच्या यात्रेची सांगता झाली. तरीही मंगळवारपर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुरू होती, असे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे यांनी सांगितले. याप्रसंगी ईश्वर तांबे, पंचायत समिती सदस्य राहुल शेळके, अप्पासाहेब शेलार, पप्पू हुमे, पोलिस पाटील बाबासाहेब हरिश्चंद्रे, मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे, बबनकाका हरिश्चंद्रे, तातेराव गोंडे, आदिनाथ वाघुडे, ग्रामस्थ भाविक उपस्थित होते. दरम्यान, परंपरेनुसार चालत आलेल्या देवी दाक्षायणी यात्रा उत्सवात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रविवारी म्हैसमाळ येथील गिरजादेवी संस्थानतर्फे दाक्षायणी देवीला साडी चोळीचा आहेर अर्पण करण्यात आला. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. गिरजादेवी म्हैसमाळ संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर जाधव, पुजारी नंदू भारती, विठ्ठल भारती, प्रकाश बनकर आदींनी दाक्षायणी देवीचे दर्शन घेतले.
कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे भगवान नृसिंह जन्मोत्सवानिमित्त वार्षिक सोंगाच्या पंचमी उत्सवाची मेढ पूजन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर १९ रोजी झाले. शिवसेना उपतालुकाप्रमुख गोकुळ गोरे, ग्रामपंचायत सदस्य ललित सुराशे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, पंचमी उत्सवाचे अध्यक्ष चंद्रभान गोरे, उपाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, सचिव सोमीनाथ बरबंडे यांच्या हस्ते मेढ पूजन झाले. प्रशांत बाप्पा कुलकर्णी यांनी विधिवत पूजा केली. शनिवार २५ पासून देवगाव रंगारीतील पंचमीचा ओटा परिसरात पंचमी उत्सव होणार आहे. हा उत्सव संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. लग्न झालेल्या मुली पंचमी उत्सवासाठी माहेरी येतात. कित्येक वर्षांची धार्मिक परंपरा सोंगाच्या पंचमी उत्सवातून सुरू आहे. पाच दिवस विविध देव-देवींची सोंगे घेतली जातात. पाच दिवस लोककलेचे संगीतमय कार्यक्रम होतात. पंचमी उत्सवानिमित्त पाच दिवस अखंड तेलाचा दिवा लावला जातो. पाच दिवसांत सुरुवात विदूषक, गणपती, सरस्वतीच्या सोंगाने होते. राम-लक्ष्मण, वेताळ, बाळंतीण, रेणुकामाता, कालिकामाता, शंकर-पार्वती, संतोषीमाता, रावण, वानर ताटी, खंडोबा, वीरभद्र, तुळजाभवानी, पाटणा देवी अशी विविध देवतांची मुखवटे, वेशभूषा परिधान करून घंटानादावर सोंगे काढली जातात. नृसिंह जयंती पर्वावर गुरुवार, ३० एप्रिल रोजी पहाटे नृसिंह महाराजांचे सोंग काढून उत्सवाची सांगता होते.
‘पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य असून त्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन हेच भविष्यासाठी अत्यावश्यक असून त्यासाठी महिलांचे नेतृत्व परिणामकारक ठरू शकते,’ असे मत जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी व्यक्त केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६ अंतर्गत जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. ५, छत्रपती संभाजीनगर यांच्या पुढाकाराने नेवरगाव येथे महिला सशक्तीकरण व जलव्यवस्थापनविषयक समन्वय सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण भागात जलसाक्षरता वाढवण्यासोबतच महिलांना जलव्यवस्थापन प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून घेण्याचा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. उपविभागीय अभियंता दीपककुमार डोंगरे यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपविभागीय अभियंता दीपककुमार डोंगरे, शाखा अभियंता तुषार विसपुते, मंगेश शेलार, नेहा धुळे तसेच गावातील मान्यवर दत्तात्रय पवार, बाबूराव नरवडे, श्रीहरी आघाडे, रामेश्वर वालतुरे, मच्छिंद्र आघाडे, सीमा दिलीप वालतुरे, कल्पना गायकवाड, विमलताई शिरसाट, कल्पना दुशिंग यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत हिवाळे यांनी केले. प्रास्ताविक लता बोरमाळे यांनी करत कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. आभार भारती साबळे यांनी मानले. उपाययोजनांची दिली माहिती कार्यक्रमात करताना प्रशांत संत यांनी जलसंधारण, पाण्याचा सुयोग्य वापर आणि शाश्वत जलव्यवस्थापन यांचे महत्त्व अधोरेखित केले विशेषतः महिलांची भूमिका अधोरेखित करत घरगुती तसेच शेती पातळीवर पाणी बचतीच्या उपाययोजनांची माहिती दिली.
राज्यावर यंदा ‘एल निनो’चे संकट घोंगावत आहे. जूनमध्ये हजेरी लावून पावसाला ऑगस्टपर्यंत खंड पडू शकतो, अशी चिन्हे आहेत. म्हणून सरकारने एल निनोशी लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जलसंपदा विभागाने राज्यातील सर्वच मनपांना पत्र पाठवून 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी 15% पाणी कपातीच्या सूचना दिल्या आहेत. ‘एल निनो’चा परिणाम शेती, उद्योग आणि बांधकामावर होऊ शकतो. त्या दृष्टीनेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेवरून उपाययोजना सुरू झाल्या आहेत. एल निनो म्हणजे काय? प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते या स्थितीला ‘एल निनो’ म्हणतात. यामुळे जागतिक तापमानात वाढ होते व उन्हाळा तीव्र जाणवतो. एल निनोचा परिणाम काय? पावसाचे ढग भारताऐवजी दक्षिण अमेरिकेकडे वळतात. भारतात मान्सूनचा पाऊस कमी पडू शकतो. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते. दर पाच-सात वर्षांनी अशी परिस्थिती येते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सरकारच्या उपयोजना काय? पहिल्यांदाच राज्याच्या अर्थसंकल्पात एल निनोचा उल्लेख झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर जलसंकटाशी मुकाबल्याची सूचना केली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे विभागीय बैठकांमधून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपाययोजना करत आहेत. धरणांची स्थिती (उपयुक्त साठा 21 एप्रिलचा)प्रकल्प आजचा साठा गेल्या वर्षीचा साठाजायकवाडी 1190.40 (54.83%) 975.43 (44.93)मांजरा 92.64 (52.35%) 61.39 (34.69%)माजलगाव 160.34 (51.50%) 62.20 (19.98%)निम्न तेरणा 66.40 (72.79%) 51.69 (56.67%)येलदरी 527.30 (65.12%) 463.94 (57.29%) 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत अडथळा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2028 ते 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट अर्थसंकल्पात ठेवण्यात आले होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या आखातातील युद्धापाठोपाठ एल निनोच्या संकटामुळे हे उद्दिष्ट गाठण्यात मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो, असे दिसू लागले आहे. 7 पिकांच्या उत्पादनात 30 ते 50% घट शक्य पीक योग्य पेरणी अंतिम 15 दिवस उशिरा 30 दिवस उशिराकालावधी तारीख उत्पादन घट उत्पादन घटकापूस/ 15 जून 10 जुलै 10 ते 25% 30 ते 50% सोयाबीन ते 5 जुलैज्वारी,तीळ 15 जुन 7 जुलै 20 जुलै 25% 30%उडीद,मूग 15 जुन 7 जुलै 15 जुलै 30 % 70 ते 90%मका 10 जून-10 जुलै 20 जुलै 10 ते 20% 40 % जून: 304 तालुक्यांत 75%पेक्षा कमी पाऊस 2023 मध्ये जूनमध्ये राज्यभर सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जूनमध्ये 358 पैकी 304 तालुक्यात मासिक सरासरीच्या तुलनेत 75 टक्क्यांपेक्षा कमी तर 29 तालुक्यात 75 ते 100 %दरम्यान आणि 22 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला होता. ऑगस्ट महिन्यात 344 तालुक्यात 75 टक्क्यांपेक्षा कमी, 9 तालुक्यात 75 ते 100 टक्के, तर 2 तालुक्यांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला होता. सोलापूरला गारपीट, नवी मुंबईतही पाऊस सोलापूर शहरात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता मात्र शहरात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. विविध भागात गारांचा पाऊस बरसला. दिवसभरातील झळांनी त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना सायंकाळी मात्र चांगलाच दिलासा मिळाला. नवी मुंबई, बदलापूर परिसरात मंगळवारी सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, पुढील 4 दिवस सोलापूरला वादळी तर राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांत पावसाचा अंदाज हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला. गुरुवारी छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि लातूर तसेच अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी तर मराठवाड्यातील इतर जिल्हे, कोकणात काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. धाराशिवला शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू धाराशिव तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील शेतकरी बबन गोविंद लांडगे (55)हे मंगळवारी दुपारी शेतात कुटुंबीयांसह कडब्याची गंजी लावत असताना अचानक त्यांच्यावर वीज कोसळली. त्यांना धाराशिव येथील वैद्यकीय रुग्णालयात आणले होते. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
स्थायी समितीने 2026-27 च्या अर्थसंकल्पात 130 कोटी रुपयांची वाढ सुचवत सत्ताधारी भाजप, शिंदे गटाच्या नगरसेवकांसाठी महापालिकेची तिजोरी खुली केली आहे. एका बाजूला भाजप नगरसेवकांना 80 लाखांचा भरघोस निधी दिला. मात्र एमआयएमच्या नगरसेवकांना 35 लाख, तर उद्धवसेनेच्या नगरसेवकांना 55 लाखांचा निधी दिला. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी सादर केलेल्या 3,354 कोटींच्या सुधारित अर्थसंकल्पात भाजपच्या एका नगरसेवकाला 80 लाख रुपये मिळतील. म्हणजेच भाजपचे 4 नगरसेवक असलेल्या प्रभागाला 3 कोटी 20 लाख मिळतील. याउलट एमआयएमच्या 4 नगरसेवक असलेल्या प्रभागाला केवळ 1 कोटी 40 लाख रुपयांवर समाधान मानावे लागेल. हा निधी एका वर्षासाठी असेल. प्लास्टिकविरोधात कारवाईवरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी झाली. नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांनी प्लास्टिकविरोधात कारवाईच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केला. उद्धवसेनेचे सचिन खैरे यांनी, प्रशासन प्रामुख्याने हिंदू वसाहतींमध्येच कारवाई करते, असा आरोप केला. त्याचा एमआयएमचे नगरसेवक सय्यद वुसमा यांनी निषेध करत या प्रश्नात राजकारण न आणण्याचे सुचवले. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी, हेल्पलाइन सुरू करून थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. महापौर समीर राजूरकर यांनी कठोर कलमे लावून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांनी आतापर्यंतच्या कारवाईची माहिती दिली. थेट सवाल अनिल मकरिये, सभापती, स्थायी समिती भाजप आणि एमआयएमच्या निधीत इतका मोठा फरक का? - मी त्यांना खरं तर 10 लाख देणार होतो. मात्र, विकासावर बोलतच नाहीत. फक्त वादग्रस्त विधाने करतात. आम्ही ‘संभाजीनगर’चे ‘औरंगाबाद’ करू, असे विषय काढून धिंगाणा घालतात. जनतेसमोर आता कसे जातात तेच बघतो. त्यांच्या या वागण्यामुळेच त्यांचा असा ‘कार्यक्रम’ केला आहे. सभापती म्हणून असा भेदभाव करणे योग्य आहे का? - मी जे केलं ते अगदी बरोबर आहे. विकासावर बोला, आम्ही निधी देऊ, पण महापौर कुठे, मंत्री कुठे, खासदार आहे का, अशी त्यांची भाषा आम्हाला पटणारी नाही. आम्ही त्यांच्यावर समाधानी नाहीत, म्हणून त्यांच्या निधीला कात्री लावली. उद्धवसेनेच्या निधीतही कपात का करण्यात आली? - त्यांनी ‘संभाजीपेठ’ नामकरणाला विरोध केला. ती देखील मामूंचीच पार्टी आहे. प्रत्येक गोष्टीत फक्त विरोध करणे हेच त्यांचे धोरण आहे. फक्त निधीचे गाजर स्थायी समितीने 130 कोटींची वाढ सुचवली, पण हा पैसा तिजोरीत येणार कुठून? उत्पन्नवाढीची कोणतीही ठोस योजना ‘बजेट’मध्ये नाही. केवळ नगरसेवकांना खुश करण्यासाठी आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कागदावर आकड्यांचा खेळ मांडण्यात आला आहे. तिजोरीत खडखडाट असताना हे वारेमाप दिलेले आकडे प्रत्यक्षात कामात उतरतील का हा मोठा प्रश्न आहे.
येत्या २५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील विकासकामे वेगाने पूर्ण करा. यात्रेपूर्वी, यात्रेत आणि यात्रेनंतरही वारकऱ्यांना येथे येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी काटेकोर नियोजन ठेवा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले. या मार्गावरील विकासकामांसाठी १,३०३ कोटींच्या आराखड्यापैकी ९६४ कोटींची कामे मंजूर झाल्याचीही माहिती दिली. मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आषाढी यात्रेच्या तयारीची आढावा बैठक झाली. ५ हजार ‘मोबाइल टॉयलेट’ गतवर्षी दोन्ही पालखी मार्गांवर ३,७०० मोबाइल शौचालये होती. यंदा ५,००० मोबाइल शौचालये पुरवण्याचे उद्दिष्ट आहे, असे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले. ७ जुलै पालख्याचे प्रस्थान २५ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ७ जुलै रोजी, तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान ८ जुलै रोजी होणार आहे. मंजूर ९३४ कोटी रुपयांपैकी ९५९ कोटींची कामे मार्गी निधीचा वापर : आराखड्यातील १,३०३ कोटींपैकी ९६४ कोटी रुपये मंजूर असून, त्यातील ९५९ कोटी रुपये खर्च करून कामे मार्गी आहेत.पूर्ण कामे: पालखीतळांवर स्वच्छतागृहांसाठी सेफ्टी टँक, कमानी, हायमास्ट पोल, भिंती, रस्ते दुरुस्ती, ‘पालखी कट्टा’कामे पूर्ण.
मुंबई आणि नवी मुंबईनंतर आता महानगर प्रदेशाचा (एमएमआर) चेहरामोहरा बदलणाऱ्या ‘मुंबई ३.०’ (तिसरी मुंबई) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ‘एमएमआरडीए’ने अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. जमिनीच्या बदल्यात केवळ रोख मोबदला देण्याची जुनी पद्धत मोडीत काढत, प्रशासनाने आता ‘सहभागात्मक मॉडेल’ लागू केले आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी आता केवळ ‘प्रकल्पग्रस्त’ न राहता, थेट या जागतिक दर्जाच्या शहरनिर्मितीचे ‘भागीदार’ बनणार आहेत. १८ एप्रिल २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली या मेगा प्रकल्पाची अधिकृत सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांसाठी फायद्याचे तीन पर्याय कोणते? 1 अविकसित जमिनीच्या बदल्यात २२.५% ‘विकसित जमीन’ परत मिळवण्याची सुवर्णसंधी.2 रोख मोबदल्याऐवजी वाढीव ‘एफएसआय’ किंवा ‘टीडीआर’ स्वरूपात थेट लाभ.3 शहराच्या वाढीव मूल्याचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा थेट वाटा स्थानिकांना मिळणार. ‘थीमॅटिक सिटी’ जागतिक दर्जाचे व्यावसायिक केंद्र हे शहर केवळ निवासी वस्ती नसेल, तर एक जागतिक दर्जाचे व्यावसायिक केंद्र असेल. यात प्रामुख्याने : ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) आणि डेटा सेंटर जिल्हा. मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स आणि अत्याधुनिक आयटी हब. जागतिक दर्जाची आरोग्य सुविधा, नॉलेज इकोसिस्टम आणि लॉजिस्टिक हब. या माध्यमातून तब्बल २ लाखांहून अधिक उच्च-कौशल्ययुक्त रोजगाराच्या संधी निर्माण होतील. २७ एप्रिलपासून ‘संमती पोर्टल’ होणार सुरू इच्छुक जमीनधारकांसाठी ‘एमएमआरडीए’ने ऑनलाईन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येत्या २७ एप्रिल २०२६ पासून नागरिक आपली कागदपत्रे आणि ओळखपत्र (उदा. आधारकार्ड) अपलोड करून आपली संमती नोंदवू शकतील. अधिक माहितीसाठी नागरिकांनी mmrda.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विश्वासाचे नाते आणि विरोध मावळला या ‘सहभागात्मक मॉडेल’मुळे स्थानिकांचा प्रकल्पांना होणारा नेहमीचा विरोध मावळला असून, सरकार आणि नागरिक यांच्यात विश्वासाचे नवे नाते निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘लोकल फॉर ग्लोबल’ या संकल्पनेला या प्रकल्पामुळे मोठी बळकटी मिळणार असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेला यातून ‘बूस्टर डोस’ मिळेल. अटल सेतू प्रभाव क्षेत्रात १२४ गावांचा कायापालट अटल सेतूच्या सान्निध्यात येणाऱ्या उरण, पनवेल व पेण या ३ तालुक्यांतील ३२३.४४ चौ.किमी क्षेत्रावर १२४ गावांच्या जमिनीवर हे शहर वसेल. जे मुंबईपेक्षा तिप्पट मोठे असेल. पहिल्याच दिवशी पेणमधून २१६ एकर भूसंपादन.
राज्य सरकारने अकृषिक (एनए-नॉन ॲग्रिकल्चरल) जमीन रूपांतरणाची प्रक्रिया आता अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक केली आहे. नागरिकांना आता जमीन ‘एनए’ करण्याचे शुल्क (प्रीमियम) ऑनलाइन भरता येणार असून, ही सुविधा ‘बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम’शी (बीपीएमएस) जोडण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी मंत्रालयात या अद्ययावत ‘बीपीएमएस’ प्रणालीचे उद्घाटन केले. या नव्या सुविधेमुळे बांधकाम परवानग्या आणि ‘एनए’ शुल्क भरणे आता एकाच छत्राखाली आले आहे. या सुविधेमुळे सरकारी कार्यायलयात एनए प्रक्रियेसाठी वारंवार हेलपाटे मारण्यापासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहा दिवसांत ‘ऑटोडीसीआर’ प्रणालीही होणार अद्ययावत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वेळी सांगितले की, बीपीएमएसप्रमाणेच आता मोठ्या विकास प्रकल्पांच्या मंजुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ऑटो डीसीआर’ प्रणालीतही युद्धपातळीवर सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. येत्या १० दिवसांत हे काम पूर्ण केले जाईल, ज्यामुळे मोठ्या बांधकाम प्रकल्पांना परवानग्या मिळण्याची प्रक्रिया आणखी सोपी आणि गतिमान होणार आहे. प्रणालीचे फायदे, शुल्क भरताच सातबाऱ्यावर आपोआप नोंद महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील सुधारणांनुसार ही नवी डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आली असून तिचे फायदे खालीलप्रमाणे आहेत
नव्या व्हिडिओत अयानकडे थार, पिस्तुलासह नोटा बंडले:अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल केल्याचा संशय
अमरावतीतील अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन प्रकरण अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून मोठी खंडणी उकळण्याचे किंवा ‘हनी-ट्रॅप’चे हे एक संघटित रॅकेट असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आरोपी अयान अहमद एका नव्या व्हिडिओत एका आलिशान ‘महिंद्रा थार’ गाडीत बसलेला दिसत आहे. त्याच्या शेजारी महागडे मोबाइल, पिस्तूलसदृश शस्त्र आणि नोटांचे मोठे बंडल आहे. एका साध्या तरुणाकडे एवढी मोठी रोकड आणि हत्यारे कोठून आली? यामागे कोणती मोठी गुन्हेगारी टोळी किंवा ‘फायनान्सर’ सक्रिय आहे का? हे महागडे मोबाइल अश्लील व्हिडिओ तयार करून त्याची विक्री करण्यासाठी वापरले जात होते का? या प्रश्नांची पोलिस उत्तरे शोधत आहेत. ९ मुलींचे व्हिडिओ झाले व्हायरल, पण तक्रारी दोनच आतापर्यंत ९ अल्पवयीन मुलींचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो व्हायरल झाले असून, केवळ दोनच तक्रारी दाखल झाल्या आहेत. आरोपींची दहशत, पैशांचा माज आणि बदनामीच्या भीतीमुळे उर्वरित कुटुंबीय गप्प असल्याचे स्पष्ट होत आहे. आता एसआयटीसमोर थार गाडी आणि रोकडीचा खरा आर्थिक स्रोत शोधण्याचे मोठे आव्हान आहे. व्हिडीओत दिसणारे पिस्तूल खरे आहे का आणि ते कुठून आले, याचा छडा लावला जात आहे. हे व्हिडिओ केवळ स्थानिक पातळीवर ब्लॅकमेलिंगसाठी वापरले की ‘डार्क वेब’ किंवा अश्लील वेबसाइटवर विकून पैसा कमावला, याचा तपास सायबर पोलिस करत आहेत. दहशतीखाली असलेल्या सात पीडितांना विश्वासात घेऊन सुरक्षा देणे, हे पोलिसांचे उद्दिष्ट आहे. अयान व त्याच्या साथीदारांना कोर्टात आणले तेव्हा बाहेरच्या जमावाने हल्ला करू नये म्हणून पोलिसांचा असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भोंदूबाबा अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. आता या भोंदू खरातचा भक्त असलेल्या ठाणे मनपातील तत्कालीन सहायक आयुक्तानेही महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी निवृत्त सहायक आयुक्त महेश आहेरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अटक झालेली नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आहेरने ठाणे मनपातील डाटा एंट्री ऑपरेटर महिलेला ‘तुझे भविष्य संकटात आहे’ असे म्हणून जाळ्यात ओढले. आता तुला नाशिकचे कॅप्टन खरातच वाचवू शकतात, असे आमिष दाखवले. भविष्य जाणून घेण्याकरीता तिला २०२३ मध्ये भोंदू खरातच्या ओकस प्रॉप्रटीमध्ये आणले. तेथे शीतपेयामधून गुंगीचे अौषध देत तिच्यावर बलात्कार केला. त्याचे व्हिडिओ चित्रीकरणही केले. या महिलेच्या तक्रारीवरून आहेरविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पिडितेने एफआयआरमध्ये नोंदवलेले असे २०२० ते सन २०२३ दरम्यान महेश भाऊराव आहेर, तत्कालिन सहाय्यक आयुक्त, ठाणे मनपा याने पदाचा गैरफायदा घेऊन त्याच्या हिरानंदानी इस्टेट रिव्हेरा बिल्डींग येथे भाड्याच्या फ्लॅटवर महिलेला नेले. तिला कोल्ड्रिंकमधून गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरिक संबंध केले. त्याचे मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून ते युट्युबवर व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शरिरसुखाची मागणी केली. दादा पाटील वाडी, नौपाडा, ठाणे येथील भाड्याचे रूममध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच नाशिकमध्ये एक प्रसिद्ध कॅप्टन अशोक खरात हे ज्योतीषी आहेत. आपण आपल्या भविष्याबद्दल त्यांच्याकडे जावुन जाणुन घेवु असे सांगून खरातच्या नाशिक येथील ओकस कार्यालयामध्ये नेले. महिलेच्या इच्छेविरुद्ध महेश आहेरने तिच्यावर लिंबू उतरवले. मोती खडा गळ्यात परिधान करण्यासाठी दिला. खरात-आहेरचा महिलेवर दबाव सूत्रांनी सांगितले की, ठाण्यातील महिलेला आहेरने नाशिक येथे आणल्यावर भोंदू खरातनेही तिच्यावर दबाव टाकला होता. पीडितेला ‘तुझे भविष्य खूप संकटात आहे तुला नाशिकचे कॅप्टन खरात वाचवू शकतात’ असे तो वारंवार सांगत होता. खरातच्या सांगण्याहून आहेरने पीडितेवरून लिंबू उतरवणे, गळ्यात मोती घालण्यास सांगून आघोरी कृत्य केले. एक बाजूला उच्चपदस्थ अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला जादूटोणा करणारा भोंदू खरात अशा जोडगोळीने पीडितेवर दबाव निर्माण केला होता. बिगर खातेदाराच्या नावे जगदंबा पतसंस्थेत ५७ लाखांचा व्यवहार सिन्नर | मी एकदाही सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडीतील जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत पतसंस्थेत गेलो नाही. मी खातेदार नाही. भोंदू खरातला एकदाही भेटलेलो नाही तरी या पतसंस्थेत माझ्या नावे खाते उघडण्यात आले. त्याला ‘वारस’ म्हणून खरातची नोंद होती. त्यावरून ५७ लाखांचे व्यवहार झाले. नंतर ते खाते बंदही करण्यात आले, अशी तक्रार नारायण घोटेकर (रा. घोटेवाडी) यांनी दाखल केली. त्यावरून सिन्नर पोलिसांनी खरातसह पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला आहे. खरातविरोधात दाखल झालेला हा १८ वा गुन्हा आहे. त्याने अशाच पद्धतीने ३२ जणांच्या नावे बनावट खाती उघडून करोडो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या चर्चेला अखेर पुष्टी मिळाली आहे. ओळखीचा फायदा घेऊन संस्थेत बनावट खाते उघडून त्या खात्याला ‘वारस’ म्हणून स्वतःचे नाव लावून हा गोरखधंदा सुरू असल्याचेही स्पष्ट झाले आहे. खरात आणि घोटेकर (रा. घोटेवाडी) यांच्या गावातील वस्त्या एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर आहेत. खरातला मळमळ अन् उलट्यांचा त्रास नाशिक | एसआयटीच्या कोठडीत भोंदू खरातला मंगळवारी सकाळी मळमळ व उलटी झाली. तो ५ आजारांवर गोळ्या औषध घेत आहे. त्याचे वजनही कमी होत आहे. अशातच रुग्णवाहिका अकादमीत शिरल्याने खरातची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात आले.
लाडकी बहीण योजनेत श्रीमंत अन् टॅक्स भरणाऱ्या महिलांसह लाडक्या दाजींनीही योजनेचा गैरफायदा घेतला होता. लाडक्या नसलेल्या या १२,७५७ दाजींनी सरकारला २२.९६ कोटी रुपयांना चंदन लावले होते. श्रीमंत बहिणींकडून वसुलीसाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना पत्र पाठवून ५० टक्के वसुली केलीसुद्धा. पण घुसखोर दाजींनी लाटलेले २२.९६ कोटींच्या वसुलीसाठी महिला व बालकल्याण विभागाकडे कुठलेही नियोजन सध्या नाहीये. डिसेंबर-२०२५ मधील ई-केवायसी व पडताळनीतून बनावट लाभार्थींचा भंडाफोड झाला होता. बोगस महिला, पुरूष लाभार्थींनी सलग १२ ते १४ महिन्यात ४६.२० कोटींना चुना लावला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्मचारी महिलांकडून वसुलीच्या सूचना दिल्या. १२,९१५ महिलांनी २३.२४ कोटी तर १२,७५७ सरकारच्या लाडक्या दाजींनी २२.९६ कोटींचा डल्ला मारला होता. मंत्री, राज्यमंत्री, सचिवांशी संवाद झाला नाही : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सचिव अनुपकुमार यादवांशी संवाद साधण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने १ ते १५ एप्रिलपर्यंत फोन केले. टेक्स्ट ही केले. व्हॉट्सअप कॉलवरही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुरूष लाभार्थी संदर्भात सरकारची नेमकी भूमिका कळु शकली नाही. लाभार्थींच्या यादीमधून आता पुरुषांची नावे वगळली लाभ घेतलेल्या पुरुषांची नावे योजनेतून वगळली. पण त्यांच्याकडून वसुलीसंदर्भातील अद्याप कोणतेही पत्र पाठवलेले नाही. बोगस महिला लाभार्थींच्या बाबतीत मात्र कारवाई होत आहे. -संतोष दळवी, कक्षाधिकारी, महिला व बालविकास विभाग, मंत्रालय पत्र देऊन ६ महिने उलटले तरीही वसुली नाही 1 घुसखोर महिला कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम-१९८१ नुसार कारवाईचे पत्र २९ जुलै २०२५ रोजी पाठवले होते. म्हणून तरी निम्मी वसुली झाली.2 पुरुषांची वसुली झाली नाही म्हणून ९ ऑक्टोबर २०२५ ला महिला व बालकल्याणचे सचिव डॉ. अनुपकुमार यादवांनी ‘ग्रामविकास’ला अहवाल मागवला.3 साडेपाच महिन्यांत बोगस महिलांपैकी निम्म्या महिलांकडूनच वसुली होऊ शकली आहे. पुरुषांची मात्र झाली नाही.4 पुरुषांकडील वसुलीसाठी विभागाने साधे पत्रही काढले नाही. त्यामुळे बोगस पुरुष लाभार्थी सरकारचे ‘लाडके दाजी’ ठरताहेत. त्यामुळे त्यांना सूट मिळाली की काय, अशीच सर्वत्र चर्चा आहे. पगारातून वसुली तृतीय अन् चतुर्थ श्रेणीच्या महिला कर्मचाऱ्यांनी १८ ते २१ हजार उचलले. या गरीब महिलांच्या पगारातून ११.१२ कोटींची वसुली केली. एक वेतनवाढ रोखण्याचाही निर्णय होईल.
अमेरिका, इराण भूमिकेवर ठाम इराण आक्रमक, ट्रम्प यांचा शेवटचा इशारा तेहरान : वृत्तसंस्था अमेरिका आणि इराण यांच्यात होणा-या दुस-या फेरीच्या चर्चेवर अनिश्चिततेचे सावट कायम आहे. अमेरिका आणि इराणचे शिष्टमंडळ चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये येत असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. मात्र, इराणने आता दबावाखाली कोणतीही चर्चा करणार नाही, अशी भूमिका घेतली आणि दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम […] The post चर्चेवर प्रश्नचिन्ह! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धाराशिव जिल्ह्यात अवकाळीने झोडपले
वडगाव सि., बावी, धारूर, केशेगाव, खामसवाडी गावांत वादळी वा-यासह गारांचा पाऊस धाराशिव : प्रतिनिधी जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल होत मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह ग्रामीण भागात वादळी वा-यासह पावसाने झोडपल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही ठिकाणी गारांचा पाऊसही झाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, लातूर, सोलापूर जिल्ह्यातही काही […] The post धाराशिव जिल्ह्यात अवकाळीने झोडपले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिक येथील नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या घटनेने राज्यात गदारोळ माजला असतानाच पुण्यातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील विश्रांती कक्षाचा वापर विशिष्ट समाजाच्या धार्मिक विधींसाठी केला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करून भेदभाव आणि नियमभंग आढळल्यास दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलिसांना दिले आहेत. संबंधित कंपनीतील पुरुष विश्रांती कक्षांचा वापर विशिष्ट गटांकडून धार्मिक विधींसाठी केला जात आहे. या कालावधीत इतर कर्मचाऱ्यांना विश्रांती कक्षात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे कार्यस्थळी उपलब्ध सुविधांचा समान वापर, कर्मचाऱ्यांचे हक्क आणि संस्थात्मक शिस्तीवर विपरीत परिणाम होत आहे, अशा तक्रारी समोर आल्या आहेत. त्यांची तातडीने दखल घेत आमदार माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलिस आयुक्तांकडे लेखी पत्र पाठवून, संबंधित कंपनी प्रशासनाशी समन्वय साधून प्रत्यक्ष परिस्थितीची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी निष्पक्ष, सखोल आणि कालबद्ध चौकशी करण्यात यावी, आवश्यकता भासल्यास गोपनीय तपास करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव, बळजबरी किंवा नियमभंग आढळल्यास तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. नाशिकमध्ये यापूर्वी अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्याचा उल्लेख करत, पुण्यातही तत्सम गैरप्रकार रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्यात याव्यात. त्यासाठी संबंधित कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधणे, विशेषतः महिला कर्मचाऱ्यांशी संवाद-समुपदेशनातून त्यांना कोणताही दबाव, छळ किंवा असुविधा भेडसावत आहेत का, याची खातरजमा करावी, असे निर्देश देखील पत्राद्वारे देण्यात आले आहेत. कार्यस्थळी सर्व कर्मचाऱ्यांना समान, सुरक्षित आणि निर्बंधमुक्त सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
अमरावती शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी चुरस:14 जण इच्छुक, विद्यमान अध्यक्ष बबलू शेखावत यांना विरोध
अमरावती शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ इच्छुकांनी हे पद स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे विद्यमान अध्यक्ष बबलू शेखावत यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस पक्षाने सध्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले असून, देशभरात 'सृजन संघटन अभियान' राबवले जात आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण आणि शहर दोन्ही जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून कौल जाणून घेण्यात येत आहे. यासाठी एआयसीसीचे निरीक्षक, हरियाणाचे आमदार आफताब अहमद आणि राज्याचे निरीक्षक, आमदार भाई जगताप यांनी चार दिवस अमरावतीत तळ ठोकला होता. निरीक्षकांसमोर मांडणी करताना, शहराध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर यांनी तर शहर काँग्रेसच्या कारभाराला कंटाळून प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सादर केला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नियमानुसार, अध्यक्षपदावर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या अध्यक्षांना पुन्हा नियुक्त करू नये. बबलू शेखावत यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने २३ डिसेंबर २०२० रोजी अमरावती शहर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांपेक्षा जास्त झाला असून, त्यांचा अर्ज स्वीकारला जाऊ नये, अशी मागणीही काहींनी केली आहे. मुलाखतीच्या काळात विश्रामगृहावर अनेक पदाधिकाऱ्यांशी 'वन टू वन' संवाद साधण्यात आला. काही जणांनी सामूहिकरित्याही आपली भूमिका मांडली. पक्षाचा नवा जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष कोण असावा, याबाबत त्यांनी मते जाणून घेतली. ही मते बंद लिफाफ्यात एका अहवालाच्या स्वरूपात २३ किंवा २४ एप्रिल रोजी पक्षश्रेष्ठींकडे सादर केली जातील. त्यानंतर साधारणतः २८ एप्रिलच्या आसपास नव्या नेतृत्वाची निवड घोषित होण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी शिवराय कुळकर्णी यांची चौथ्यांदा निवड झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी त्यांच्या पुनर्निवडीची घोषणा केली. कुळकर्णी यांची सलग चौथ्यांदा या पदावर निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना कुळकर्णी म्हणाले, 'पक्षाची बाजू योग्यरीतीने मांडण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन. तसेच, भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी आणि विजयासाठी कार्यरत राहण्यासाठी मी कटिबद्ध आहे.' आजवरच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब करत सलग चौथ्यांदा प्रवक्तेपदी निवड केल्याबद्दल कुळकर्णी यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश सरचिटणीस आणि अमरावतीचे प्रभारी आमदार संजय कुटे तसेच भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांप्रतीही कृतज्ञता व्यक्त केली.
अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याप्रकरणी अटकेत असलेला अयान अहमद आणि त्याच्या तीन साथीदारांची पोलीस कोठडी (PCR) २७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. मंगळवारी त्यांना अचलपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाबाहेर हिंदुत्ववादी संघटनांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते निदर्शने करत होते. आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी त्यांची मागणी होती. कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याने न्यायालयाबाहेर पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली होती, ज्यामुळे न्यायालयाला छावणीचे स्वरूप आले होते. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान, सहायक सरकारी वकील डी. ए. नवले आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी सर्व चारही आरोपींची पुन्हा आठवडाभराची पोलीस कोठडी मिळवली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदचा एक नवीन व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. या व्हिडिओमध्ये अयान महिंद्रा थार गाडीत बसलेला दिसत असून, त्याच्या शेजारी महागडे मोबाईल, पिस्तूलसदृश वस्तू आणि नोटांचे बंडल ठेवलेले आहेत. पोलिसांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, अयानने हे वाहन कोठून मिळवले, त्यातील शस्त्र खरेच पिस्तूल आहे का आणि नोटांचे बंडल कोणाचे होते, याचा तपास करण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी वाढवणे आवश्यक आहे. एसआयटी यंत्रणेतील अधिकाऱ्यांचा हा युक्तिवाद योग्य वाटल्याने न्यायालयाने अयानसह चौघांच्याही पोलीस कोठडीत एक आठवड्याची वाढ केली. अयान, त्याचे साथीदार उजेर खान इकबाल खान, मो. साद इकबाल खान आणि तरबेज खान मो. साबीर यांच्यावर १३ एप्रिल रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९४, पॉक्सोचे कलम ८ व १२ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ व ६७ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती. आतापर्यंत अयान अहमदने आठ अल्पवयीन मुलींशी, तर त्याचा साथीदार उजेरने एका मुलीशी गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. या गैरवर्तनाचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो या दोघांसह त्यांच्या अन्य दोन साथीदारांनी व्हायरल केले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सुमारे ४७ अधिकारी-कर्मचाऱ्यांची एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन केली आहे. चार दिवसांपूर्वी अयानविरुद्ध एका १५ वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली होती, ज्याचा जबाब एसआयटीने नोंदवून घेतला आहे. तसेच, दोन दिवसांपूर्वी उजेरविरुद्ध एका १६ वर्षीय मुलीच्या आईने तक्रार नोंदवली आहे, ज्यात उजेर तिला सतत संदेश पाठवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अमरावती: जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांनी मंगळवार, २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे महसूल विभागाचे १०० टक्के तर आरोग्य विभागाचे ७० टक्के कर्मचारी कामावर नाहीत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी तहसील कार्यालयातून दिले जाणारे दाखले मिळू शकले नाहीत. दुसरीकडे, आरोग्य विभागातील परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात पर्यायी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सरकारी-निमसरकारी-शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने या आंदोलनाची हाक दिली आहे. समितीचे निमंत्रक डी. एस. पवार यांच्या दाव्यानुसार, मंगळवारी सकाळपासूनच विविध कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयासमोर एकत्र येत न्याय हक्काच्या घोषणा दिल्या आणि विभागप्रमुखांना निवेदने सादर केली. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व तहसील व एसडीओ कार्यालये, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, वन विभाग, आरटीओ, हिवताप, नगरपालिका, विमा आणि बँकांसह सुमारे ३० हजार कामगार व कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मोठ्या सहभागामुळे बहुतेक कार्यालये ओस पडली आहेत. संपात सहभागी झालेल्या संघटनांच्या प्रमुखांनी दुपारनंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कोषागार कार्यालयात सभा घेतल्यानंतर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कचेरीसमोर निदर्शने केली. शासनाने पुढाकार न घेतल्यास बुधवारीही संप सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. डी. एस. पवार यांच्यासह भास्कर रिठे, अनिल मानकर, विजय सावरकर, डी. व्ही. देशमुख, एस. डब्ल्यू शिर्के, निखील हजारे, अमर सोनवळकर, वर्षा पागोटे, ॲड. एस. डी. कपाळे आदी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील सुमारे ७० टक्के कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉक्टर्स आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोग्य विभागाचा कारभार चालवला जात आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, या संपामुळे महसूल यंत्रणा पूर्णतः ठप्प झाली आहे. तहसील आणि एसडीओ कार्यालयातून जात, उत्पन्न, अधिवास, सॉल्व्हन्सी प्रतिज्ञापत्र आणि इतर प्रमाणपत्रे दिली गेली नाहीत. जिल्ह्यातील सुमारे दीड हजार महसूल कर्मचाऱ्यांपैकी कंत्राटी कर्मचारी वगळता सर्वजण संपात सहभागी आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील २४५ पैकी २४० कर्मचारी संपावर असून, ५ जणांनी पूर्वपरवानगीने रजा घेतली आहे.
अविचारी व्यक्तीमुळे सामाजिक प्रदूषण वाढले : प्रा. कळमकर
उदगीर : प्रतिनिधी ज्यांच्याकडे विचार आहे, अशा व्यक्तींनी व्यक्त व्हायचे असते मात्र सध्या ज्याच्याकडे विचारच नाही, अशा व्यक्ती समाज माध्यमातून व्यक्त होत आहेत. त्यामुळे सामाजिक प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. संजय कळमकर यांनी केले. भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्य लाल बहादूर शास्त्री विद्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते . या कार्यक्रमास प्रमुख […] The post अविचारी व्यक्तीमुळे सामाजिक प्रदूषण वाढले : प्रा. कळमकर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जळकोट तहसील कार्यालयातील कर्मचारी संपावर
जळकोट : प्रतिनिधी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन लागू करा, निवृत्तीचे वय ६० वर्षे करा, रिक्त पदे भरा आदी प्रलंबित मागण्यांसंदर्भात सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांसह चतुर्थश्रेणी कर्मचा-यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी मंगळवारी दि. २१ एप्रिलपासून बेमुदत संप सुरू केला आहे. जळकोट येथील तहसील कार्यालयातील जवळपास ५० कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे जळकोट तहसील कार्यालयात […] The post जळकोट तहसील कार्यालयातील कर्मचारी संपावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, २१ एप्रिलपासून राज्यव्यापी संपावर गेले आहेत. या संपामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महसूल विभागाचे ८३५ कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या या संपात राज्यातील १७ लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महसूल विभागात एकूण १०१२ कर्मचारी आहेत. त्यापैकी ८३५ कर्मचारी संपात सहभागी झाले, तर ३३ जण पूर्वपरवानगीने रजेवर होते. केवळ १४४ कर्मचारी कामावर हजर होते. संपात बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाल्याने सकाळपासून महसूल विभागाच्या सर्वच कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. दुपारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे आपल्या कामांसाठी आलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पैठण तालुक्यातील काही शेतकरी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते, परंतु कर्मचारी नसल्याने त्यांचे निवेदन स्वीकारले गेले नाही. त्यांना दोन तास अधिकाऱ्यांची वाट पाहावी लागली. रसूल शेख यांच्यासह अनेक नागरिक कार्यालयात येऊन परत गेले. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक सुनावण्या लांबणीवर पडल्या. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील महसुली कामकाजही ठप्प झाले आहे. सह जिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी विभागातील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने एकही दस्ताची नोंदणी झाली नाही. नोंदणी विभागातील अधिकारीही कार्यालयात गैरहजर होते. दरम्यान, मराठवाडा विभागातील महसूल विभागाचे कामकाजही या संपामुळे पूर्णपणे ठप्प झाले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये एकूण ७०६६ महसूल कर्मचारी आहेत. त्यापैकी तब्बल ५६२० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. ३२० कर्मचारी पूर्वपरवानगीने रजेवर असून, केवळ ११२६ कर्मचारी कामावर हजर होते, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाने दिली. या मोठ्या सहभागामुळे संपूर्ण मराठवाड्यातील महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
उजनी येथे ‘शिवसंकल्प’च्या वतीने देशी वृक्षांची लागवड
औसा : प्रतिनिधी सहकारमहर्षी तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंकल्प फाऊंडेशनच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, उजनी येथे ७६ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि वृक्षचळवळीस नव्याने बळ देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते झाले. यावेळी […] The post उजनी येथे ‘शिवसंकल्प’च्या वतीने देशी वृक्षांची लागवड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वरळी येथे महायुतीच्या 'आक्रोश मोर्चा'मुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना खरीखोटी सुनावली. या प्रकरणावरून आता विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधण्यात येत आहे. भाजपच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा 'इथून चालते व्हा' हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला, अशा बोचऱ्या शब्दांत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपच्या इव्हेंटबाजीला मुंबईकर महिलेने वास्तवाचा आरसा दाखवला असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर न झाल्याने महायुतीच्या वतीने काँग्रेससह इतर विरोधी पक्षांविरोधात आज (२१ एप्रिल) वरळीत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, या मोर्चामुळे दुपारच्या सुमारास वरळी आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. दुपारी १ च्या सुमारास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिक हैराण झाले होते. याच कोंडीत अडकलेल्या एका महिलेचा संताप अनावर झाला आणि तिने गिरीश महाजन यांना झापले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आता यावरून विरोधकांना भाजपवर टीका करण्याची संधी मिळाली आहे. नेमके काय म्हणाले विजय वडेट्टीवार? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडिओ शेअर करत भाजपवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, भाजपच्या महिला आघाडीला वाटलं असेल की घोषणाबाजीने आसमंत दणाणून सोडला की महिलांचे प्रश्न सुटले! पण भाजपच्या कार्यकर्त्यांना काय माहित, की खरी नारी शक्ती काय असते! त्यांच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा इथून चालते व्हा हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला. इव्हेंटच्या कॅमेऱ्यात शक्ती प्रदर्शन शूट होत असताना अचानक सामान्य मुंबईकर महिलेने भाजपला आरसा दाखवला. विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या आंदोलनाच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, एकीकडे आरक्षणाचे कागदी घोडे नाचवायचे आणि इव्हेंट करणाऱ्याच्या नादात रस्ते अडवायचे, ही कसली पद्धत? कदाचित भाजपला वाटलं असेल की ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर जनतेला आरक्षणाचे महत्त्व जास्त चांगल्या प्रकारे समजेल. पण मुंबईकर महिला आहे ती, तिला भाजपच्या इव्हेंट बाजी दिसली आणि तिथेच तिने सुनावले! भाजपचे आंदोलन फक्त दिखावा महिला आरक्षणाच्या नावाखाली धुंदीत असलेल्या नेत्यांना वास्तवाचा चटका दिला तो एका महिलेने. महिलांच्या प्रगतीचा रस्ता विरोधकांनी अडवला म्हणून बोंबाबोंब करणाऱ्यांना जनतेचे रस्ते अडवून धरल्यावर, सामान्य महिलेने त्यांना 'रस्ता' दाखवला यातच सगळं आलं! भाजपचे आंदोलन म्हणजे फक्त दिखावा होता. पण महिला आघाडी विरुद्ध एकटी महिला असा सामना झाला तेव्हा निकाल वास्तवाच्या बाजूनेच लागला! हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले? महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरत खोटे नॅरेटिव्ह पसरवणा-या भाजपाचा खरा चेहरा या भगिणीने वरळीहून निघालेल्या मोर्चासमोर जाऊन उघडा पाडला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. महिला आरक्षणाच्या आडून संविधान आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याचा भाजपाचा डाव ‘इंडिया’ आघाडीने आधीच हाणून पाडला होता. त्यानंतर आता मोर्चे आणि प्रचाराच्या माध्यमातून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता; मात्र या धाडसी भगिनीने तोही डाव उधळून लावला आहे, असेही ते म्हणाले. आज फक्त मंत्री गिरीष महाजन यांना पळवून लावले आहे. येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपाला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. रोहित पवार काय म्हणाले? या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, अनेक लोकांना आरोग्याच्या अडचणी असतात आणि अशा परिस्थितीत केवळ केंद्रातून आदेश आले म्हणून आणि His Masters Voice ला खूष करण्याच्या प्रयत्नात एखादा पक्ष लोकांना तीन-तीन तास ट्रॅफिकमध्ये अडकवून ठेवत असेल तर त्याची जोरदार रिॲक्शन मिळणारंच.. अशाच एका संतप्त महिलेचा मुंबईतील व्हिडिओ बघायला मिळाला. आंदोलनाचं कारण सत्य असेल तर लोकं समजून घेतात... पण खोट्यासाठी लोकांना वेठीस धरलं जात असेल तर लोक तोंडावर कशी फजिती करतात, हेच या व्हिडिओतून दिसतं. आता त्रस्त व्यक्ती रागावल्याने काही वेळा शब्द चुकीचे जाऊ शकतात पण म्हणून संबंधित लाडक्या बहिणीवर कारवाई न करता तिच्या भावना समजून घेऊन तिला त्रास देणाऱ्यांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे…!. असेही रोहित पवार म्हणालेत.
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी मुंबई येथे राज्याचे संस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ७५ विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक विभाग सचिव किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, “मला जाणीवपूर्वक याचा उल्लेख करावा लागेल की, आपल्या देशातील युवकांमध्ये, युवतींमध्ये किंवा नागरिकांमध्ये प्रचंड सृजनशीलता, नाविन्यता, कौशल्यता आणि कल्पकता आहे. माननीय पंतप्रधान मोदीजी नेहमी म्हणतात, एक सॉफ्ट पॉवर या पद्धतीची ताकद आपल्या भारतामध्ये आहे. त्याचं चित्र आणि अनुभूती आपल्याला प्रदर्शनाला भेट दिल्यावर येते.” मंत्री शेलार पुढे म्हणाले की, “पंतप्रधानांचे संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित आहे. जगभरातल्या प्रवासात त्यांना ज्या काही भेटवस्तू मिळतात त्या भेट वस्तू सुद्धा जाहीर लिलाव करून, त्यातून उभा राहणार निधी हा प्रधानमंत्री राहत कोशमध्ये दिला जातो. आजपर्यंत एकही महिन्याचे मानधन किंवा पगार मुख्यमंत्री असल्यापासून पंतप्रधान असेपर्यंत या व्यक्तीने घेतलाच नाही. आपला पगार देखील राहत कोशमध्ये दिला. एक असा पंतप्रधान, की ज्याने एक दिवस देखील सुट्टी घेतली नाही. या दृष्टीने या कल्पनेतून या कार्यक्रमाचे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक विभाग आणि चित्रनगरी विभागाने यासाठी प्रयत्न केले.” “ही प्रदर्शनी इतर ठिकाणी देखील मांडण्यात येईल. चित्रनगरी सरकारी कंपनी आहे. यातून जे उत्पन्न मिळते ते देखील विविध सामाजिक कार्यांसाठी वापरले जाते. यातून येणारा सीएसआर सात संस्थांना ६५ लाख रुपये देण्यात येत आहेत. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळो.” अशा शब्दात मंत्री आशिष शेलार यांनी गौरव केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांस्कृतिक विभागाचे सचिव किरण कुलकर्णी म्हणाले की, “बक्षीस म्हणून दिला जाणारा निधी असो किंवा संस्थांना सामाजिक बांधिलकी म्हणून दिलेला निधी असो. आपल्या सर्वांचे ध्येय एक आहे ते म्हणजे आपला देश. याच प्रतिबिंब चित्रप्रदर्शनात पाहायला मिळाले.” या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दादासाहेब फाळके चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील यांनी केले. स्पर्धेचा उद्देश देशाच्या प्रगतीचा आणि दूरदृष्टीचा कलात्मक पद्धतीने सादरीकरण करुन ‘विकसित भारत’ या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने ही राष्ट्रीय पोस्टर डिझाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा २० सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतभरातून आणि विविध वयोगटांमधून सुमारे ३ हजाराहून नोंदी प्राप्त झाल्या. पद्मश्री पुरस्कारप्राप्त व्यक्तींसह भारतातील नामवंत क्रिएटिव्ह दिग्गजांनी काटेकोर मूल्यमापन व परीक्षक प्रक्रियेत सहभाग घेतला आणि अंतिम ७५ विजेत्यांची निवड या स्पर्धेत करण्यात आली. स्पर्धेचे विषय यास्पर्धेमध्ये स्वतंत्र डिझायनर, ब्रँडिंग व डिझाइन स्टुडिओ, जाहिरात व क्रिएटिव्ह एजन्सीज, तसेच डिझाइन व व्हिज्युअल कम्युनिकेशनचे विद्यार्थी अशा सर्वांना आपली कला सादर करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली. या स्पर्धेसाठी एकूण ९ विषय देण्यात आले होते. त्यात,आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान, योग, वेव्ह्ज समिट,मेक इन इंडिया, स्किल इंडिया आणि क्लायमेट चेंज (हवामान बदल) या विषयांचा समावेश होता. या स्पर्धेचे परिक्षण पुढील परिक्षकांनी केले
महिला आरक्षण विधेयक नामंजूर करून विरोधकांनी देशातील नारीशक्तीचा घोर अपमान केला असून, ही कृती म्हणजे लोकशाहीतील महिलांच्या हक्कांची ‘भ्रूणहत्या’च आहे. या अन्यायाविरोधात आता महाराष्ट्रातून १ कोटी महिलांच्या स्वाक्ष-या गोळा करून अभूतपूर्व जनरेटा उभा केला जाईल. या जनशक्तीसमोर विरोधकांना गुडघे टेकून मान्यता द्यावीच लागेल असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ […] The post मुख्यमंत्र्यांचे ओपन चॅलेंज! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कृष्णा मुखेडकर यांच्या सुरेल गायनाने रसिकांची मने जिंकली
लातूर : प्रतिनिधी भारतीय शास्त्रीय संगीतातील महान गुरू पं. शांताराम चिगरी गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त सुरताल संगीत महाविद्यालय, नवीन रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, लातूर येथे सुरताल संगीत सभेचे आयोजन करण्यात आले. या संगीत सभेत युवा गायक कृष्णा मुखेडकर (बिदर) यांनी आपल्या प्रभावी आणि सुरेल गायनाने रसिकांची मने जिंकली. ते ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पद्मश्री पं. उल्हास […] The post कृष्णा मुखेडकर यांच्या सुरेल गायनाने रसिकांची मने जिंकली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वगळलेल्या ट्रिगरचा पीक विमा योजनेत समावेश करा
लातूर : प्रतिनिधी पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतक-यांना वैयक्तिक पातळीवर नुकसान भरपाई देणारे ट्रिगर/जोखमीच्या बाबींचा येणा-या हंगामात समावेश करावा व २०२५ ची पीक विमा नुकसान भरपाई तात्काळ शेतक-यांना द्यावी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटना तथा स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना देण्यात आला आहे. २०२५ पासून राज्य सरकारने पंतप्रधान […] The post वगळलेल्या ट्रिगरचा पीक विमा योजनेत समावेश करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉ. गोपाळराव पाटील यांच्या पार्थिवाचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी घेतले दर्शन
लातूर : लातूरचे माजी खासदार तथा शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील यांचे मंगळवारी सकाळी निधन झाल्याची बातमी कळताच राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी डॉ. गोपाळराव पाटील यांच्या जुना औसा रोडवरील निवासस्थानी जाऊन डॉ. गोपाळराव पाटील यांच्या पार्थिव देहाचे अंतिम दर्शन घेतले त्यांना पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी विनायकराव […] The post डॉ. गोपाळराव पाटील यांच्या पार्थिवाचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी घेतले दर्शन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर : प्रतिनिधी मोठ्या कालावधीपासून प्रलंबीत असलेल्या मागण्यांसाठी राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांसह लातूर जिल्ह्यातीलही कर्मचारी दि. २१ एप्रिलपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे विविध कार्यालयांत शुकशुकाट होता. कोणत्याही जाचक अटीशिवाय राज्यातील सर्व कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना १०, २० आणि ३० वर्षांनंतरचे पदोन्नती लाभ तात्काळ लागु करावेत, सर्व […] The post कर्मचारी संपावर; कार्यालये ओस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉ. गोपाळराव पाटील यांच्यावर अन्त्यसंस्कार
लातूर : प्रतिनिधी शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या पार्थिवावर दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता नवी एमआयडीसी येथील शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे क्रीडा मैदान, संत तुकाराम नॅशनल मॉडेल शाळेजवळ शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार, जिल्हा बँकेचे […] The post डॉ. गोपाळराव पाटील यांच्यावर अन्त्यसंस्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने ‘स्पेशल फोर्स’च्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. बाल विवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ नुसार १८ वर्षांखालील मुलगी व २१ वर्षांखालील मुलाचा विवाह लावणे हा दंडनीय गुन्हा असून, बाल विवाह मुक्त राज्य बनविण्यासाठी महिला व बालविकास विभाग बाल विवाह मुक्त भारत हे अभियान राबवित असून, अतिशय कडक कारवाई करत राज्य देशात आघाडीवर आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काही भागांत पारंपरिक पद्धतीने अल्पवयीन बालकांचे विवाह लावण्याची प्रथा अद्यापही आढळून येते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने “बाल विवाह मुक्त भारत” या १०० दिवसांच्या अभियानांतर्गत व्यापक जनजागृती, समन्वय आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून यंत्रणा अधिक सजग केली आहे. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, प्रकरण व्यवस्थापन, कुटुंबाचा सातत्याने पाठपुरावा, तसेच शिक्षण, कौशल्य विकास, समुपदेशन आणि पोषण सेवांशी समन्वय साधण्याचे काम या अभियानामार्फत राबविण्यात आले होते. कुठे किती बालविवाह रोखले? असे एकूण ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळाले असल्याचे आदिती तटकरे म्हणाल्या. कठोर कारवाई सुरूच राहणार बालविवाह हा केवळ कायद्याचा भंग नसून बालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे. बालविवाह रोखण्याबरोबरच संबंधित बालिकांच्या पुनर्वसन, शिक्षण आणि संरक्षणासाठीही ठोस पावले विभागामार्फत उचलली जात आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पालक व मध्यस्थांवर कारवाई सुरू असून, यापुढेही अशा घटना घडू नये यासाठी कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. या अभियानाच्या अनुषंगाने विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी, तज्ज्ञ प्रतिनिधी तसेच राज्यातील सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि चाइल्ड हेल्पलाइन प्रतिनिधी सहभागी झाले होते.
महिला आरक्षण विधेयक संमत न झाल्याच्या निषेधार्थ आज वरळीत महायुतीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मात्र, या मोर्चात एक वेगळाच पेच पाहायला मिळाला. मोर्चामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीत तासाभरापासून अडकलेल्या एका सामान्य महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला. लोकांना वेठीस धरून रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा बाजूच्या मैदानात जा, अशा शब्दांत या महिलेने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याने मोर्च्याच्या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर न झाल्याने महायुतीच्या महिला आघाडीने काँग्रेससह इतर विरोधी पक्षांविरोधात आज (२१ एप्रिल) वरळीत मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, या मोर्चामुळे दुपारच्या सुमारास वरळी आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. दुपारी १ च्या सुमारास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिक हैराण झाले होते. लोकांना त्रास देणारे हे कसले आंदोलन? याच कोंडीत अडकलेल्या एका महिलेचा संताप अनावर झाला. ती आपल्या कारमधून खाली उतरली आणि थेट मोर्चाच्या ठिकाणी पोहोचली. तिथे उपस्थित महिलांना आणि पोलिसांना जाब विचारत तिने गोंधळ घातला. एका तासापासून मी इथे अडकले आहे. लोकांच्या कामाला आणि मुलांच्या शाळेला अडथळा निर्माण करून हे कसले आंदोलन? असा सवाल करत तिने आंदोलनकर्त्यांना सुनावले. मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर संताप या मोर्चामध्ये भाजपचे संकटमोचक समजले जाणारे मंत्री गिरीश महाजन आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे सहभागी झाल्या होत्या. संबंधित महिलेने थेट त्यांच्यासमोर जाऊन वाहतूक कोंडीचा पाढा वाचला. आम्हाला त्रास देऊ नका, आंदोलन करायचे असेल तर मैदानात करा. महिलेने सांगूनही कुणी ऐकत नसल्याचे पाहून ‘तुम्हाला समजत नाहीये का?’ असा सवाल गिरीश महाजन यांना केला. यावेळी तिने पोलिसांनाही रस्ता रिकामा करण्यासाठी धारेवर धरले. पोलिसांना परिस्थिती हाताळताना मोठी कसरत करावी लागली. रोहित पवारांची सरकारवर टीका या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, अनेक लोकांना आरोग्याच्या अडचणी असतात आणि अशा परिस्थितीत केवळ केंद्रातून आदेश आले म्हणून आणि His Masters Voice ला खूष करण्याच्या प्रयत्नात एखादा पक्ष लोकांना तीन-तीन तास ट्रॅफिकमध्ये अडकवून ठेवत असेल तर त्याची जोरदार रिॲक्शन मिळणारंच.. अशाच एका संतप्त महिलेचा मुंबईतील व्हिडिओ बघायला मिळाला. आंदोलनाचं कारण सत्य असेल तर लोकं समजून घेतात... पण खोट्यासाठी लोकांना वेठीस धरलं जात असेल तर लोक तोंडावर कशी फजिती करतात, हेच या व्हिडिओतून दिसतं. आता त्रस्त व्यक्ती रागावल्याने काही वेळा शब्द चुकीचे जाऊ शकतात पण म्हणून संबंधित लाडक्या बहिणीवर कारवाई न करता तिच्या भावना समजून घेऊन तिला त्रास देणाऱ्यांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे…!. असेही रोहित पवार म्हणालेत.
भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांची विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर त्यांनी अध्यक्षपदासाठी मिळणारी शासकीय गाडी नाकारत, त्यातून वाचणारा निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मंगळवारी पुणे महानगरपालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत प्रभाग २५, शनिवार पेठ महात्मा फुले मंडई येथील नगरसेवक मानकर यांची विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. पदभार स्वीकारताना त्यांनी आपल्या कार्यकाळात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणार असल्याचे सांगितले. अध्यक्षपदी निवड होताच बाप्पू मानकर यांनी एक नवा आदर्श घालून दिला. त्यांनी महापालिकेकडून प्रभाग समिती अध्यक्षांना मिळणारी शासकीय चारचाकी गाडी नम्रपणे नाकारली. या वाहनावर होणारा वार्षिक खर्च पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वर्ग करावा, अशी लेखी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे. यापूर्वीही त्यांनी नगरसेवक पदाचे मानधन नाकारून तो निधी महापौर वैद्यकीय सहायता निधीमध्ये वर्ग केला होता. नागरिकांच्या कररूपी पैशातून मिळणाऱ्या अवास्तव सुविधा न घेता, केवळ 'सेवक' म्हणून काम करणे हेच माझे ध्येय आहे, अशी भावना बाप्पू मानकर यांनी यावेळी व्यक्त केली.
वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा वीजबिलासंबंधी तक्रारींसाठी थेट वीज कर्मचाऱ्यांना फोन करण्याऐवजी टोल फ्री क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे. 1912, 1800-233-3435 आणि 1800-212-3435 या 24 तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकांवर तक्रारी नोंदवाव्यात, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यासाठी महावितरणची यंत्रणा 24 तास कार्यरत असते. राज्यात सुमारे तीन कोटी तर छत्रपती संभाजीनगर परिमंडलात साडेतेरा लाखांहून अधिक वीजग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करते. ग्राहकांच्या मीटरपर्यंत येणारी वीज हजारो किलोमीटरच्या जाळ्यातून येते, ज्यात अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित अडथळे येतात. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. सध्या अनेक ग्राहक ऑनलाइन पर्यायांऐवजी वैयक्तिक तक्रारींवर अधिक भर देत असल्याने यंत्रणेचा वेळ खर्ची पडत आहे. महावितरणची सेवा मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे सर्वांना सहज व 24 तास उपलब्ध आहे. शेकडो कर्मचाऱ्यांसह ही सेवा केंद्रे कार्यरत आहेत. ग्राहकांनी तक्रार नोंदवताना त्यांचा 12 अंकी ग्राहक क्रमांक दिल्यास महावितरणला संबंधित माहिती तात्काळ उपलब्ध होते. यामुळे फॉल्ट शोधण्यासाठी वेळ वाया जात नाही आणि तक्रार थेट संबंधित शाखा कार्यालयाला वर्ग होते. ऑनलाइन प्रणालीत नोंद झालेल्या तक्रारींचे विद्युत नियामक आयोगाने घालून दिलेल्या मानकांनुसार वेळेत निराकरण करणे बंधनकारक असते. टोल फ्री क्रमांकावर आलेल्या तक्रारींची नोंद ऑनलाइन प्रणालीत होते, याउलट एखाद्या वीज कर्मचाऱ्याला फोनवर आलेल्या तक्रारींची नोंद होत नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यास कर्मचाऱ्याला एकाच वेळी अनेक फोन येतात, ज्यामुळे त्याला फॉल्ट शोधणे कठीण होते. तसेच, खांबावर किंवा वीज वाहिनीवर काम करताना फोनवर बोलणे कर्मचाऱ्याच्या जीवावरही बेतू शकते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही टोल फ्री क्रमांकांचा वापर महत्त्वाचा आहे.
CSMT स्थानकावर दोन लोकल आमनेसामने:मोठा अनर्थ टळला, स्टेशन मास्तर निलंबित; रेल्वे प्रशासनाची कारवाई
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दोन लोकल एकाच ट्रॅकवर आमनेसामने आल्याची अत्यंत गंभीर घटना घडली असून, याप्रकरणी मध्य रेल्वे प्रशासनाने तत्काळ पावले उचलत संबंधित स्टेशन मास्तरला निलंबित केले आहे. सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला असला, तरी प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड आणि संभाव्य धोक्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. बदलापूरहून येणारी फास्ट लोकल नियोजित प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ऐवजी अचानक 5 कडे वळवण्यात आली, जिथे आधीच एक लोकल उभी होती. मात्र समोर दुसरी गाडी असल्याचे लक्षात येताच मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि तातडीने लावलेल्या ब्रेक्समुळे दोन्ही गाड्यांमध्ये अवघ्या 120 मीटरचे अंतर राहिले आणि मोठी दुर्घटना टळली. रेल्वेच्या सिग्नल आणि ट्रॅक व्यवस्थापनातील संभाव्य त्रुटीमुळे घडलेल्या या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत, प्रशासनाने जबाबदारी निश्चित करत संबंधित स्टेशन मास्तरला निलंबित केले आहे. तज्ज्ञांच्या मते, दोन गाड्या एकाच ट्रॅकवर येण्याची घटना अत्यंत दुर्मिळ असून, सिग्नल प्रणाली किंवा ट्रॅक कंट्रोल यंत्रणेत मोठा बिघाड झाल्यासच अशी परिस्थिती उद्भवू शकते. याच कारणामुळे रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणातील तांत्रिक त्रुटींचा सखोल तपास केला जात आहे. सीएसएमटी येथील ही घटना रेल्वेच्या सुरक्षितता यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे. दुसरीकडे, रेल्वेच्या कामकाजात बुधवारी झालेला हा सलग तिसरा बिघाड ठरल्याने प्रवाशांचा संयम सुटला आहे. पहाटे खर्डी येथील ब्लॉकची वाढलेली वेळ आणि त्यानंतर डोंबिवलीत पूर्वसूचनेशिवाय घेतलेला ब्लॉक यामुळे लोकलचे वेळापत्रक आधीच कोलमडले होते. त्यातच सीएसएमटी येथील या घटनेची भर पडल्याने सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. या गोंधळामुळे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागला असून, रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
संसाराची स्वप्ने डोळ्यांत घेऊन नातेवाईकाच्या लग्नाला निघालेल्या नवदाम्पत्यावर काळाने भीषण झडप घातली आहे. विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पाटण तालुक्यातील येरफळे गावच्या हद्दीत सोमवारी दुपारी पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात राजू झोरे (वय २५) आणि राणी झोरे (वय २३) हे पती-पत्नी जागीच ठार झाले. अवघ्या दहा दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. हातावरची मेहंदी आणि अंगाची हळदही अजून उतरली नव्हती, तोच या दोघांचा अंत झाल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सडादाढोली (ता. पाटण) येथील राजू आणि राणी यांचा दहा दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहात विवाह पार पडला होता. सोमवारी त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाचे शिराळा (जि. सांगली) येथे लग्न होते. या लग्नासाठी हे दाम्पत्य दुचाकीवरून निघाले होते. मात्र, येरफळे गावच्या हद्दीत समोरून येणाऱ्या एका भरधाव पिकअप गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची भीषणता काळजाचा थरकाप उडवणारी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार एका ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येणाऱ्या पिकअपची (क्र. MH-50-AM-0814) समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचे पुढचे चाक निखळून लांब पडले, तर पिकअपच्या काचेचाही चक्काचूर झाला. या धडकेत राजू झोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या राणी झोरे यांना तातडीने कराड येथील रुग्णालयात हलवण्यात येत होते, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. मेहंदीचा रंग ओसरण्यापूर्वीच होत्याचे नव्हते झाले दहा दिवसांपूर्वी ज्या घरात सनई-चौघड्यांच्या सुरात मंगलमय वातावरण होते, तिथे आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश पाहायला मिळत आहे. सडादाढोली गावावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. नववधूच्या हातावरील मेहंदी अजून तशीच होती, तोच काळाने या जोडीला हिरावून नेल्याने अंत्यविधीवेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. पिकअप चालक पोलिसांच्या ताब्यात अपघाताची माहिती मिळताच पाटणचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पिकअप चालक सचिन यशवंत मोहिते (रा. बोंद्री, ता. पाटण) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या भीषण अपघाताचा अधिक तपास करत आहेत. हे ही वाचा… मराठीच्या सक्तीवरून रिक्षाचालक युनियन आक्रमक:4 मे पासून 15 लाख चालकांचा राज्यव्यापी संपाचा इशारा, 28 एप्रिलला अल्टिमेटम राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून आता मोठा पेच निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मे पासून या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असतानाच, रिक्षाचालकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने याविरोधात एल्गार पुकारला आहे. या नियमाच्या निषेधार्थ ४ मे पासून राज्यातील तब्बल १५ लाख रिक्षाचालक बेमुदत संपावर जाण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…
'पोलीस भरती' झाल्याचे सांगून तरुणाने वाटले पेढे:नऱ्हे येथे फसवणूक करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
पुणे, प्रतिनिधी: नऱ्हे येथील एका तरुणाने आपण पोलीस दलात भरती झाल्याचे खोटे सांगून सोसायटीत पेढे वाटले आणि चौकात अभिनंदनाचे फलक लावले. नऱ्हे पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्याचे अभिनंदन करण्यासाठी गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. समाजात प्रभाव पाडण्यासाठी तरुणाने ही बतावणी केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऋषीकेश राजू जाधव (वय २६, रा. तिडके डेअरीजवळ, नऱ्हे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीकेशचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. त्याला पोलीस दलात भरती होण्याची इच्छा होती, परंतु उंची कमी असल्यामुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. कुटुंबीयांनी त्याला व्यवसायावर लक्ष केंद्रित करून लग्नाचा विचार करण्यास सांगितले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याने कुटुंबीयांना आपण पोलीस दलात भरती झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने सोसायटीत आणि चौकात स्वतःचे अभिनंदन करणारे फलक लावले. या फलकांवर त्याचे छायाचित्र आणि पोलीस दलाचे बोधचिन्ह होते. याशिवाय, ऋषीकेशने पोलीस गणवेशातील छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित केली होती. ही माहिती मिळाल्यानंतर नऱ्हे पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्याचे अभिनंदन करण्यासाठी गेले. त्यावेळी चौकशी केली असता, ऋषीकेशची पोलीस दलात निवड झाली नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्याचा खोटेपणा देखील उघडकीस आला. शासकीय सेवेत निवड झाली नसतानाही त्याने पोलीस गणवेश परिधान करून छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास नऱ्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार एस शिंदे करत आहेत.
काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ. जफर अहमद खान यांचे सोमवारी रात्री पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. डॉ. खान यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. जफर अहमद खान हे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांनी संजयनगर प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून येत महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. शहराच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. राजकीय क्षेत्रात त्यांचे सर्वच पक्षांतील नेत्यांशी चांगले संबंध होते. त्यांच्या साधेपणासाठी ते ओळखले जात होते. त्यांनी कर्नाटक आणि राजस्थान राज्यांचे प्रभारी म्हणूनही काम केले. काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलसह विविध पदांवर त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान होते. अखेरच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाची बातमी शहरात येताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शोक पसरला. काँग्रेसचे शहर अध्यक्ष युसुफ शेख यांनी शोक व्यक्त करत, काँग्रेसच्या विचारधारेसोबत एकनिष्ठपणे चालणारा नेता गमावल्याची भावना व्यक्त केली. डॉ. खान यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून आता मोठा पेच निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मे पासून या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असतानाच, रिक्षाचालकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने याविरोधात एल्गार पुकारला आहे. या नियमाच्या निषेधार्थ ४ मे पासून राज्यातील तब्बल १५ लाख रिक्षाचालक बेमुदत संपावर जाण्याची शक्यता आहे. परिवहन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, आता परवाना (Permit) मिळवण्यासाठी आणि रिक्षा-टॅक्सी चालवण्यासाठी चालकाला मराठी भाषा येणे बंधनकारक आहे. १ मे (महाराष्ट्र दिन) पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. नियम न पाळणाऱ्या आणि मराठी येत नसलेल्या चालकांविरुद्ध १ मे पासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ४ मे पासून १५ लाख चाकं थांबणार? 'मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियन'ने सरकारच्या या 'मराठी सक्ती'च्या धोरणाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ४ मे पासून पुकारण्यात आलेल्या या संपामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे १५ लाख रिक्षाचालक या आंदोलनात सहभागी होतील. एकट्या मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) ५ लाख चालक संपावर जाणार असल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आदेश मागे घ्या, अन्यथा रोज निदर्शने; युनियनचा इशारा रिक्षाचालक संघटनांच्या मते, भाषेची अट लादणे हे अन्यायकारक आहे. युनियनच्या नेत्यांनी म्हटले आहे की, सरकारने हा आदेश तातडीने मागे न घेतल्यास केवळ संपच नाही, तर दररोज तीव्र निदर्शने केली जातील. दरम्यान, संपावर जाण्यापूर्वी युनियनचे शिष्टमंडळ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देणार आहे. 'द टाइम्स ऑफ इंडिया'ने या संबंधीचे वृत्त दिले आहे. प्रवाशांची कोंडी होण्याची शक्यता महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर सुरू होणाऱ्या या वादाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसणार आहे. जर सरकारने माघार घेतली नाही, तर रस्त्यांवरील रिक्षांची संख्या लक्षणीयरीत्या घटणार आहे. या मुद्द्यावर तोडगा न निघाल्यास रेल्वे स्थानके, बस डेपो आणि विमानतळाबाहेर प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते. आता २८ एप्रिलला होणाऱ्या बैठकीत परिवहन मंत्री संघटनांची मागणी मान्य करतात की आपल्या निर्णयावर ठाम राहतात, यावर ४ मे चा संप अवलंबून असणार आहे. हे ही वाचा… घाटीत परिचारिकांचा बेमुदत संप सुरू:पहिल्याच दिवशी रुग्णसेवा विस्कळीत, प्रशासनाची धावपळ छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील परिचारिकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे पहिल्याच दिवशी रुग्णालयातील रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. पाचशेहून अधिक परिचारिका या संपात सहभागी झाल्या आहेत. सविस्तर वाचा…
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. तसेच अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या, असे आवाहनही सुळे यांनी केले आहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, याठिकाणी येत असताना मी आशाकाकींची भेट घेतली. पण मी सांगता सभेला जात आहे हे त्यांना सांगण्याची हिंमत मला झाली नाही. मागील दोन अडीच महिने आपल्यासाठी खूप कठिण होते, असे सांगितले. आपण वहिनींच्या प्रचारासाठी येथे जमलेले आहोत. अजितदादा आज आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. घरातील एक कर्ता पुरुष, एक भाऊ आज आपल्यात नाही याचे दुःख कायम राहील असे सांगितले. तसेच महाविकास आघाडीतील नेते, प्रत्येक कार्यकर्ता, आणि बारामतीतील मतदार या निवडणुकीत वहिनींसोबत ताकतीने उभा राहील असा शब्द दिला. बारामती आणि पवार कुटुंबाचे एक वेगळे नाते पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मागील सहा दशकापासून बारामती आणि पवार कुटुंबाचे एक वेगळे नाते राहिलेले आहे. बारामतीकरांचे प्रेम आणि विश्वासामुळे येथे एक मोठा विक्रम होणार आहे. ज्या आदरणीय पवार साहेबांना बारामतीने सहा दशके साथ दिली, तेथे या देशात सगळ्यात जास्तवेळा निवडणून येण्याचा मान हा बारामतीकरांना मिळणार आहे. ही परंपरा आपल्या आशीर्वादाने सुरू झाली असे नम्रतापूर्वक नमूद केले. आदरणीय पवार साहेब येथे कार्यरत होते, त्यानंतर दादांवर येथील जबाबदारी आली. त्यांनी पूर्ण निष्ठेने ३५ वर्षे या भागाची सेवा केली आणि बारामतीची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष झाला पण बारामतीकरांनी कधीही साथ सोडली नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. आता होणारे मतदान विक्रमी होईल याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या निवडणुकीत वहिनी विजयी होतील असा शब्द दिला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा होती. त्यामुळे आम्ही उमेदवार देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण काही लोकांचे अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. पण आता होणारे मतदान विक्रमी होईल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी मतदान यंत्रावरील एक नंबरवरील वहिनींचे नाव आणि घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून दादांना आदरांजली श्रद्धांजली द्या, आणि वहिनींना साथ द्या, असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एक ऐतिहासिक आणि भावूक घडामोड समोर आली आहे. १९६७ मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत कधीही आपला मतदानाचा हक्क न चुकवणाऱ्या शरद पवार यांना यंदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानापासून दूर राहावे लागणार आहे. ही माहिती स्वतः शरद पवार यांनी सोशल मीडियाद्वारे दिली असून, त्यांनी बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभेच जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक होत असून, सुनेत्रा पवार महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे बारामतीत आज सुनेत्रा पवारांसाठी भव्य सांगता सभा पार पडली. या सभेला महायुतीतील तिन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांसह शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली होती. शरद पवार मात्र प्रकृती ठीक नसल्याने ते प्रचार सभेला येऊ शकले नाही. त्यातच आता आपण पोटनिवडणुकीत मतदान करू शकणार नसल्याचे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले. शरद पवार यांची सोशल मीडिया पोस्ट जशास तशी शरद पवार म्हणाले, मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजुन घेतील याची मी खात्री बाळगतो, असे शरद पवार यांनी म्हटले. आमच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे. स्व. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे शरद पवार म्हणाले. बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे. ते या आवाहनास प्रतिसाद देतील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणुक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली. परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचे राज्याच्या निवडणुक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अखेर अतिशय व्यथित व जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला. या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावे, असे आवाहन शरद पवार यांनी बारामतीकरांना केले आहे.
भारत श्रीलंकेपर्यंत पाईपलाईन टाकणार
कोलंबो : श्रीलंकेत आता बंदरांसाठी नाही, तर तिथल्या तेल आणि पेट्रोल पुरवठ्यावर नियंत्रण मिळवण्याची लढाई सुरु झाली आहे. जो देश श्रीलंकेच्या ऊर्जा म्हणजे वीज आणि इंधनावर कंट्रोल मिळवेल तिथे त्या देशाची पकड बनेल. आतापर्यंत चीन तिथे मोठ-मोठे पावर प्लांट आणि बंदरं बनवत होता. पण आता चीनची नजर थेट श्रीलंकेच्या पेट्रोल पंपावर आणि तेल डेपोवर आहे. […] The post भारत श्रीलंकेपर्यंत पाईपलाईन टाकणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी दोन्ही पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक चांगली व सुविधायुक्त करण्यात यावीत, वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी तसेच पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पालखी मार्गांवरील विश्रामस्थळ सुविधा निर्मिती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांची माहिती दिली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांसाठी सुमारे १३०३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी ९६४ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातील ९५९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या आराखड्यांतर्गत दोन्ही पालखी मार्गातील पालखीतळांच्या ठिकाणी स्वच्छतागृहांसाठी सेफ्टी टँक, कमानीचे बांधकाम करणे, जमीन सपाटीकरण करणे, हायमास्ट पोल उभारणे, संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे, रस्त्यांची दुरुस्ती, पालखी कट्टा तयार करणे आदी कामांपैकी बहुतांश कामे पूर्ण झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पालखी मार्गावरील महामार्गांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यंदा २५ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान ८ जुलै रोजी तर श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ७ जुलै रोजी होणार आहे. दोन्ही पालखी मार्गावर वारकरी भाविकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी. पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांशी चर्चा करून त्यांना आणखी कोणत्या सुविधा हव्यात त्या करून द्याव्यात. पालखी तळावर कायमस्वरुपी पायाभूत सुविधांची कामे करावीत. पालखी तळावर वारकऱ्यांसाठी गेल्या वर्षी हँगरची व्यवस्था करण्यात आली होती, त्या प्रमाणे यंदाही अतिरिक्त हँगरची व्यवस्था करावी. पालखी मार्गावरील महामार्गांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत. पुलकुंडवार म्हणाले की, पालखी मार्गावरील विकास कामे पूर्ण करण्यात येत असून यावर्षी वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे. गेल्या वर्षी दोन्ही पालखी मार्गावर ३७०० मोबाईल शौचालये पुरविण्यात आली होती. यंदा ५ हजार मोबाईल शौचालये पुरविण्याचे नियोजन आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने दोन्ही पालखी मार्गावरील महामार्गाची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. दिवेघाट ते हडपसर आणि बारामती ते इंदापूर मार्गांची कामे सुरू आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई रवींद्रन, सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री महोदय यांचे सचिव राजेश देशमुख, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. बारामतीच्या ऐतिहासिक शारदा प्रांगणात विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. यावेळी आपल्या पतीच्या आठवणींनी सुनेत्रा पवार यांना अनेकदा गहिवरून आले. मी माझे सर्वस्व हरपले, पण मी थांबणार नाही, खचणार नाही, मागे हटणार नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच येसुबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपल्या लोकांना न्याय दिला, त्याच निष्ठेने मी तुमची सेवा करेल, असे आश्वासन बारामतीच्या जनतेला दिले. सुनेत्रा पवार म्हणाल्या, या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सुरुवातीलाच मी मनापासून आभार मानते. पवार साहेब व सुप्रिया सुळेंचे विशेष आभार मानते. मला पाठिंबा उत्स्फुर्तपणे जाहीर पाठिंबा देणाऱ्या संस्था आणि संघटनांचे ऋण व्यक्त करते. हा पाठिंबा म्हणजे बारामतीच्या भवितव्याबद्दलची एकत्रित बांधिलकी आहे, असे मी मानते. पवार कुटुंबाच्या सामाजिक आणि राजकीय वारशाची पायाभरणी करणाऱ्या अजित पवारांच्या आजी शारदाबाई पवार यांचे आवर्जून आभार मानते. त्यांनी एक सून म्हणून केवळ पवारांचे कुटुंब सांभाळले नाही, तर त्यांनी संस्कार, नितीमुल्य आणि संघर्षाची भक्कम परंपरा निर्माण केली. यामधून पुढे विविध क्षेत्रांमध्ये मोठे नेतृत्व घडत गेले. त्यांनी कुटुंबापुरतेच मर्यादित न राहता, समाज आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीतही मोलाचा वाटा उचलला. वारसा संघर्षाचा आणि कर्तृत्वाचा पवार साहेबांच्या दूरदृष्टीमधून आपण बारामतीच्या विकासाचा पाया रचला. खऱ्या अर्थाने अजितदादांनी अपार कष्टाने त्यावर कळस चढवला. पवार साहेबांचे आशीर्वाद आपल्यासाठी मोलाचे आहेत. आमच्या आई आशाताई अनंतराव पवार यांचा आशीर्वाद हा आमच्यासाठी सर्वात मोठा आधार आहे. खरं सांगायचं तर, बारामतीच्या ऐतिहासिक शारदा प्रांगणात आज आपल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा होत आहे. आपल्याला माहीत आहे की, या मैदानाला संघर्षाची, एकजुटीची मोठी परंपरा आहे. या प्रांगणात अजितदादांना अनेकवेळा नागरी सत्कार करण्यात आलेला आहे. आज या सांगता सभेला उसळलेला जनसागर म्हणजे अजितदादांविषयी असलेला आपला सन्मान, आदर आणि प्रेम म्हणायला हरकत नाही. दादांशिवाय सभा घ्यावी लागेल, असे वाटले नव्हते या मंचावर उभे राहताना माझ्या अंतकरणात भावनांचा कल्लोळ माजला आहे. अजितदादांशिवाय आपल्याला ही सभा घ्यावी लागत आहे, हे मानायला मन तयारच नाही. गेली ३५ वर्षे पवार साहेबांच्या पावलांवर पाऊल टाकत अपार कष्ट करून दादांनी ही बारामती उभी केली. त्यांच्याशिवाय ही सभा घ्यावी लागेल, असे कधी स्वप्नातही वाटले नाही. आज बारामतीतील अबालवृद्ध दादांच्या आठवणीत अजुनही शोकाकुल आहे. दादा आपल्यात नाहीत, कटू सत्य स्वीकारावे लागेल मोबाईलवर अजितदादांचे व्हिडिओ पाहतात, त्यांचे भाषणे ऐकतात आणि अजितदादा अजुनही आपल्यात आहेत, या आभासेपोटी अजूनही त्याच भावनेत आहेत. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. त्यामुळे दादा आपल्यात नाहीत, यावर अजुनही विश्वास बसत नाही. अनेकजण म्हणतात, दादा परत येतील, मात्र दादा आपल्यात नाहीत हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावे लागेल. दादांचे कार्य, त्यांची स्वप्ने या आपल्या सगळ्यांना मिळून पुढे घेऊन जावी लागणार आहेत. दादा कायम जनहितासाठी अविरत झटत राहिले अजितदादांनी विकसित केलेल्या बारामतीला राज्याचे विकासाचे मॉडेल बनवले होते. बारामतीला संपूर्ण देशात एक नंबरचा तालुका बनवणे हे दादांचे स्वप्न होते. अजितदादांनी १९८४ मध्ये सक्रीय राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून जनतेशी जोडलेली नाळ त्यांनी कधीच तोडली नाही. त्यांच्या राजकीय जीवनात आपण सगळेजण साक्षीदार आहात. अनेक चढउतार आले. पण ते कधीच डगमगले, खचले नाही. सत्ता असो वा नसो, दादा जनहितासाठी अविरत झटत राहिले. दररोज १६-१७ तास काम करणाऱ्या दादांनी या राज्याला समर्पित जनसेवेचा वास्तुपाठ घालून दिला. वक्तशीरपणा आणि आर्थिक शिस्त या दोन गुणांच्या जोरावर दादांनी आर्थिक घडी बसवली. दादांनी विकासाच्या आड राजकारण आणले नाही अर्थसंकल्पाची विक्रमी ११ वेळा जबाबदारी पार पाडताना, राज्याला विकासाने स्थैर्य देण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेललेले आपण सर्वांनी पाहिले आहे. मात्र, हे करत असताना त्यांनी विकासाच्या आड कधीही राजकारण आणले नाही. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देताना दादांनी कधीच धर्म, पंथ कधीच बघितला नाही. दादांना प्रत्येक गावखेड्याची नस अजूक माहिती होती. त्याच जोरावर त्यांनी लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केलेले होते. आपल्या कामाच्या माध्यमातून सर्वांना आपलेसे करणारे ते आगळेवेगळे व्यक्तीमत्व होते. ...त्याबद्दल मी सर्वांचीच मनापासून ऋणी बारामतीकरांच्या मनात दादांबद्दल अपार प्रेम आणि अढळ श्रद्धा आहे. बारामतीच्या घरातील तीन पिढ्या दादांच्या विचारांशी, कार्याशी आणि मूल्यांशी मनापासून जोडल्या गेलेल्या आहेत. ही केवळ साथ नाही, तर भावनेने बांधलेली घट्ट कौटुंबीक नाळ आहे. म्हणूनच तीन पिढ्यांचा विश्वास आणि आपुलकी हीच दादांच्या कार्याची खरी ताकद आहे. दादांच्या पुण्याईने बारामतीकरांसह संपूर्ण महाराष्ट्राकडून मला आणि माझ्या दोन मुलांना गेल्या दोन-अडीच महिन्यापासून भरभरून प्रेम, भावनिक आधार आणि खंबीर पाठिंबा मिळवला. त्याबद्दल मी सर्वांचीच मनापासून ऋणी आहे. तुमचा विकास हाच दादांप्रमाणे माझाही ध्यास आज मी इथे उभी आहे, महायुतीचा उमेदवार म्हणून. फक्त उमेदवार म्हणून नाही, दादांची स्वप्न घेऊन उभी आहे. त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी रणांगणात उतरली आहे. ही लढाई सोपी नाही, पण मी एकटी नाही. मला विश्वास आहे की माझ्या पाठीशी बारामतीकरांची ताकद उभी आहे. ही माती माझी आहे. तुम्ही माणसे माझी आहात आणि तुमचा विकास हाच दादांप्रमाणे माझाही ध्यास आहे. माझे सर्वस्व हरपले, सुनेत्रा पवार भावुक आज मी केवळ मत मागायला आलेली नाही. मी नाते टिकवायला आलेले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही. माझं दुःख फार मोठं आहे. माझे तर सर्वस्व हरपले आहे. पण लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि माझ्याकडे आशेने पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यानंतर दादांचे स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि त्यांच्या पश्चात माझ्यावर आलेली जबाबदारी या साऱ्यांच्या बळावर हे शिवधनुष्य उचलून, तुमच्या सर्वांच्या आधाराने पुढे चालत राहण्याचा निर्धार केला आहे. यावेळी सुनेत्रा पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मी एका संघर्षयोद्धाची सहचारिणी, खचणार नाही दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्याच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करेल. दुःखाला कवटाळून न बसता मी विकास कामासाठी अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवणार. माझ्यासोबत कुणी असो वा नसो, जोपर्यंत तुम्ही बारामतीकर जनता माझ्या पाठिशी आहात, तोपर्यंत मी थांबणार नाही, खचणार नाही, मागे हटणार नाही. मी एका संघर्षयोद्धाची सहचारिणी आहे. येसुबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपल्या लोकांना न्याय दिला, त्याच निष्ठेने मी तुमची सेवा करेल. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा ही महाराष्ट्राची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा तीच मुलभूत दिशा राहिलेली आहे. यापुढेही ती तशीच राहील, अशी मी सर्वांना खात्री देते. अपघात प्रकरणी जे दोषी असेल त्याला कठोर शिक्षा व्हावी सुनेत्रा पवार म्हणाल्या, अजितदादांच्या अपघाताची चौकशीसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांनी यात निष्पक्ष तपास होईल असे आश्वासन दिले आहे. जे कोणी दोषी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, हीच माझी देखील भावना आहे. सुनेत्रा पवारांनी केले मतदानासाठी आवाहन सुनेत्रा पवार म्हणाल्या, येत्या 23 तारखेला तुम्ही जे मत देणार आहात, ते केवळ एक उमेदवार म्हणून दिलेले मत नसेल, तर तुमचे आदरणीय दादांच्या प्रती असलेले प्रेम, नातं, ऋणानुबंध आणि दादांची तुमच्या सर्वांच्या प्रती असणारी आपुलकी व कौटुंबिक नातं दर्शवणारं द्योतक असेल. प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करणे ही आपली जबाबदारी आहे. येत्या 23 तारखेला आपला मतदानाचा पवित्र हक्क बाजावण्यासाठी बारामतीला आवर्जून यावे असे आवाहन मी करते. उन्हाळा आहे त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने आपण सर्व काम करू.
पुणे जिल्ह्याने आठव्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्याच्या जनजागृती उपक्रमात देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, ९ एप्रिल २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये हे उपक्रम राबवले जात आहेत. या पंधरवड्यात आतापर्यंत २ लाख ८८ हजार ४३४ उपक्रम घेण्यात आले आहेत. या कामगिरीमुळे जिल्ह्याने देशात द्वितीय स्थान मिळवले आहे. अहमदनगर जिल्हा प्रथम स्थानी असून, बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या पंधरवड्याचे राष्ट्रीय स्तरावरील उद्घाटन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णादेवी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले होते. जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यंदाचा पंधरवडा 'बालकांच्या जीवनातील पहिल्या ६ वर्षांतील मेंदूचा विकास' या मुख्य संकल्पनेवर आधारित आहे. यामध्ये माता व बालकांचे पोषण, शून्य ते तीन वर्ष वयोगटातील बालकांच्या मेंदूच्या विकासासाठी पूर्व उद्दीपन, तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी खेळ आधारित पूर्व शालेय शिक्षण, बालकांचा स्क्रीनवरील वेळ कमी करण्यासाठी पालकांची भूमिका आणि अंगणवाडी केंद्रे सक्षम करण्यासाठी समुदायाचा सहभाग वाढवणे या प्रमुख विषयांवर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने गाव पातळीवर आरोग्य, शालेय शिक्षण, ग्रामविकास आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयाने हे अभियान राबवले जात आहे. ग्रामपंचायत व अंगणवाडी स्तरावर मशाल फेरी, पाककृती स्पर्धा, पोषण रॅली, माता बालक आरोग्य मार्गदर्शन शिबिरे, आहार प्रात्यक्षिके, गृहभेटी तसेच पालक बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांमध्ये महिला, पालक व स्थानिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी केले. अंगणवाडी स्तरावरील उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील तसेच महिला व बाल कल्याण सभापती अंकिता पाटील यांनी सर्व यंत्रणांचे कौतुक केले, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी आनंद खंडागळे यांनी दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने सारसबागेजवळील हिराबाग कोठी परिसरात मोफत आरोग्य सेवा केंद्राचे लोकार्पण केले आहे. 'रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा' या ब्रीदानुसार उभारलेल्या या केंद्रात रुग्णांना विविध प्रकारच्या तपासण्या, औषधे, श्रवणयंत्रे आणि कृत्रिम अवयव मोफत मिळणार आहेत. राज्याच्या आरोग्य सेवा विभागाचे संचालक डॉ. विजय कंदेवाढ यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे, आयएमएचे डॉ. विरेंद्र ओस्तवाल, डॉ. अमरीश दरक, डॉ. संदेश पटवर्धन, तसेच ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. विजय कंदेवाढ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सध्या आरोग्यासाठी खूप काही करण्याची गरज आहे. ट्रस्टने उभारलेल्या या मोफत आरोग्य केंद्राचा लाभ गरीब आणि गरजू जनतेला होईल. मोबाईल आरोग्य व्हॅनची संकल्पना उत्तम असून, दुर्गम व ग्रामीण भागांत दात, डोळे आणि कानाची तपासणी करून आरोग्य सेवा देता येणार आहे. आमदार हेमंत रासने यांनी नमूद केले की, 'जय गणेश रुग्णसेवा अभियाना'च्या माध्यमातून हजारो रुग्णांना दिलासा मिळत आहे. शासकीय व धर्मादाय यंत्रणांनी ट्रस्टला यात मोठे सहकार्य केले आहे. पुणे शहर आणि महाराष्ट्र राज्य निरोगी राहावे, हा यामागील मुख्य उद्देश असून, सर्वांना तत्परतेने आरोग्यसेवा मिळतील, असा प्रयत्न केला जाईल. हे मोफत आरोग्य सेवा केंद्र सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते ५ या वेळेत खुले राहणार आहे. येथे विविध रक्त तपासण्या, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, जनरल ओपीडी, हृदय ईसीजी, दंत तपासणी, दात काढणे, लहान मुलांसाठी लसीकरण सुविधा, कृत्रिम हात व पाय वाटप नोंदणी आणि श्रवण तपासणी यांसारख्या सेवा उपलब्ध असतील. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत असेल. अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक ९८८१५१६५१७ किंवा ९९२३५१६५१७ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी रुग्णांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीतील विलंबावरून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. हा विलंब भाजपचा सुनियोजित राजकीय कट असून, महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचनेचा फायदा घेणे हाच सत्ताधारी पक्षाचा खरा हेतू असल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसने या विधेयकाची तात्काळ आणि विनाअट अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या निगहत अब्बास यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत हे मत व्यक्त केले. त्यांच्या मते, २२ सप्टेंबर २०२३ रोजी संसदेत एकमताने मंजूर झालेले 'नारी शक्ती वंदन विधेयक' गेल्या तीन वर्षांपासून जाणीवपूर्वक लागू करण्यात आले नाही. १६ एप्रिल २०२६ रोजी अचानक काढलेल्या अधिसूचनेमुळे सरकारच्या हेतूवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. काँग्रेसने थेट सवाल केला आहे की, जर सरकार खरोखरच प्रामाणिक होते, तर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या कायद्याची अंमलबजावणी का केली नाही? भाजप केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी निवडणूक सीमांमध्ये फेरफार करण्यासाठी 'मतदारसंघ पुनर्रचना' रेटून नेत असल्याचा आरोपही पक्षाने केला. महिला आरक्षणात केवळ अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) महिलांचा समावेश पुरेसा नाही, तर इतर मागासवर्गीय (OBC) महिलांनाही त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळणे आवश्यक आहे, असे काँग्रेसने म्हटले. यासाठी व्यापक जातीनिहाय जनगणना करणे ही काळाची गरज असून, सरकार यात सातत्याने विलंब करत असल्याचा आरोपही करण्यात आला. जनगणनेला होणारा विलंब हा सामाजिक न्याय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न असून, भाजपची कार्यपद्धती 'विलंब करा, लक्ष भरकटवा आणि नाकारा' (Delay, Distract, and Deny) अशी असल्याची टीका काँग्रेसने केली. काँग्रेसने सरकारसमोर काही अनुत्तरित प्रश्न उपस्थित केले आहेत: लोकसभेच्या सध्याच्या ५४३ जागांच्या मर्यादेतच हे आरक्षण का लागू होऊ शकत नाही? आणि राज्यांच्या प्रतिनिधित्वाचे समायोजन कसे केले जाईल, हे कायद्यात स्पष्ट का नाही? संसदेत मंजूर झालेले कायदे केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत यायला हवेत, असे काँग्रेसने ठणकावून सांगितले. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार दिप्ती चवधरी, माजी नगरसेवक अजित दरेकर, शिवा मंत्री, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, प्राची दुधाणे, सिमा सावंत, सुंदर ओव्हाळ आदी उपस्थित होते. सर्वपक्षीय बैठकीचे आवाहन पुढील दिशा ठरवण्यासाठी काँग्रेसने सरकारला २९ एप्रिल २०२६ नंतर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पारदर्शक चर्चेसाठी प्रस्तावित दुरुस्त्या लेखी स्वरूपात सादर करून पावसाळी अधिवेशनापर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. भाजपने महिलांचा राजकीय ढाल म्हणून वापर करणे थांबवावे. जर हेतू प्रामाणिक असेल, तर मतदारसंघ पुनर्रचनेचा अट न घालता महिला आरक्षण तात्काळ लागू करावे, असे सांगत भारताची जनता हे सर्व पाहत असल्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे.
नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमध्ये २८ फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात झाली होती, हे युद्ध तब्बल ३९ दिवस चालले, ४० व्या दिवशी अखेर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला. इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला आहे. हा युद्धविराम संपण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. युद्धविरामानंतर अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची […] The post भारतात उसळणार महागाईचा आगडोंब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई येथे एका अनधिकृत फटाका कारखान्यात आज दुपारी भीषण स्फोट झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत भावेश दिलीप वावरे (२५) या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून, चार महिला कामगार गंभीर जखमी झाल्या आहेत. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या या मृत्यूच्या कारखान्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोणसई परिसरात एका शेतात सुतळी बॉम्ब आणि इतर घातक फटाक्यांचे उत्पादन अनधिकृतपणे सुरू होते. आज अचानक झालेल्या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, त्याचा आवाज परिसरात दूरवर ऐकू आला. स्फोटानंतर कारखान्याला मोठी आग लागली. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी कारखान्यात सुमारे ३२ कामगार काम करत होते. सुदैवाने बहुतांश कामगार बाहेर असल्याने मोठी जीवितहानी टळली. जखमींची प्रकृती चिंताजनक मोनिका पडवळे, मोनिका जाधव, अर्चना मिसाळ, जयश्री रावते अशी जखमी कामगारांची नावे आहे. या जखमी झालेल्या महिलांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी एका महिला कामगाराची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वाडा तालुक्यात सुरू असलेल्या सर्व अनधिकृत फटाके कारखान्यांवर तातडीने कारवाई करून त्यांना बंद करण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे संकेत दिले असून पुढील तपास सुरू आहे. प्रशासकीय दुर्लक्ष की मूकसंमती? स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. कोणतीही परवानगी नसताना आणि सुरक्षा उपाययोजना नसताना हा कारखाना भरवस्तीच्या जवळ सुरू कसा होता? असा सवाल नागरिक विचारत आहेत. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या डोळ्यांदेखत हे बेकायदेशीर उद्योग सुरू असल्याचा गंभीर आरोपही स्थानिकांनी केला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास विलंब झाला, ज्यामुळे नुकसानीची तीव्रता वाढली.
मुंबईच्या गजबजलेल्या उपनगरी रेल्वे सेवेत मंगळवारी दुपारी एक मोठा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात दुपारी सुमारे 3.18 च्या सुमारास दोन लोकल गाड्या एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरहून येणारी एक जलद लोकल नियोजित प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ऐवजी चुकीने प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर वळवण्यात आली. त्याच वेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आधीच एक दुसरी लोकल उभी होती. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही चूक घडल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. दोन लोकल समोरासमोर येत असल्याचे लक्षात येताच संबंधित मोटरमनने तात्काळ ब्रेक लावले. त्याच्या तत्परतेमुळे दोन्ही गाड्यांमधील अंतर अगदी कमी राहिले असले तरी संभाव्य टक्कर टळली. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ते 8 वरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे थांबवली. त्यामुळे काही काळ स्थानक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एकाच ट्रॅकवर आलेल्या लोकलला सुरक्षितपणे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पूर्ण करण्यात आली, कारण प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते. रेल्वे प्रवाशांचे झाले मोठे हाल ही घटना गर्दीच्या वेळेत घडल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. जलद मार्गावरील सेवा ठप्प झाल्याने मुंबई शहरातील विविध स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवर अडकून पडले, तर काहींना पर्यायी प्रवासाचा मार्ग शोधावा लागला. स्थानकांवर घोषणा करून प्रवाशांना परिस्थितीची माहिती देण्यात येत होती. रेल्वे प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, सिग्नल यंत्रणेत नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला याचा सखोल तपास सुरू केला आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सुधारणा आणि उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या बॅकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली असून, काही विलंबानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, सेवा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईच्या उपनगरी रेल्वे व्यवस्थेतील तांत्रिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राज्यात गारपिटीसह विजांचा कडकडाट
मुंबई : प्रतिनिधी सध्या राज्यात पश्चिम विक्षोभाची (वादळ) स्थिती आहे. त्यातच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. परिणामी, राज्यात उन्हाळ्यातच पावसाळी वातावरण तयार झाले आहे. हवामान खात्याने आज मंगळवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) जाहीर केलेल्या ५ दिवसांच्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी […] The post राज्यात गारपिटीसह विजांचा कडकडाट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सलग दुस-या दिवशी महिला आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांवर घणाघात केला. महिला आरक्षणाच्या मुद्यावर विरोधक खोटा प्रचार करत आहेत. ते सीरियल लायर अर्थात अट्टल खोटारडे आहेत. महिलांना हक्काचे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत विरोधकांना शांतपणे झोपू देणार नाही असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी […] The post विरोधक रोज खोटे बोलतात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या एक सक्षम महिला म्हणून देशभरात नावारुपास येतील, असा ठाम विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी व्यक्त केला. घराचा आधार हरवला. पण घर अजूनही हातात हात घेऊन उभे आहे. सुनेत्राताई अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत आहेत. त्यामुळे आपल्याला ताईंसोबत खंबीरपणे उभे राहायचे आहे, असे ते म्हणालेत. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची आज बारामतीत सांगता सभा झाली. या सभेत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीकरांना सुनेत्रा पवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आाहन केले. ते म्हणाले, महायुती व महाविकास आघाडीतील पुढाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता सुनेत्राताईंना पाठिंबा दिला. तसेच काँग्रेस अध्यक्षांनाही पाठिंबा देण्यास सांगितले. याविषयी सर्वांचे आभार. पण इतर उमेदवारांनीही सुनेत्रा पवारांना बिनशर्त पाठिंबा देण्याची गरज होती. कारण, घराचा आधार हरवला तरी घर अजूनही हातात हात घेऊन ठामपणे उबे आहे. बारामतीकरांना वाटेल, सुनेत्रा पवार निवडूनच येणार आहेत, आपल्या एका मताने काय फरक पडेल. पण असे चालणार नाही. आपल्यासाठी एकेक मत महत्त्वाचे आहे. सुनेत्रा पवार अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत आहेत. त्यामुळे आपल्याला ताईंसोबत खंबीरपणे उभे राहायचे आहे. सुनेत्रा पवार देशातील एक सक्षम नेत्या भुजबळ यांनी यावेळी सुनेत्रा पवार देशातील एक सक्षम महिला नेत्या म्हणून पुढे येतील असा ठाम विश्वासही व्यक्त केला. ते म्हणाले, देशात अनेक महिला मुख्यमंत्री झाल्या. उपमुख्यमंत्री झाल्या. राष्ट्रपती झाल्या. पंतप्रधान झाल्यात. त्यामुळे ताईंना तुम्ही केवळ राज्याच्या नाही, तर देशाच्या नेत्या म्हणून निवडून देणार आहात. त्यामुळे आपल्या सर्वांना मतदान करणे महत्त्वाचे आहे. सुनेत्रा पवार एक सक्षम महिला म्हणून देशात नावारुपास येतील यात शंका नाही. त्यांच्यात जनतेचे दुःख समजून घेण्याची संवेदनशीलता आहे. त्यांना बारामतीला देशाच्या नकाशावर एका नव्या उंचीवर न्यायचे आहे. भुजबळांचे भाषण सुरू असतानाच सुप्रिया सुळे व्यासपीठावर छगन भुजबळांचे भाषण सुरू असतानाच व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे आगमन झाले. त्यावेळी भुजबळांसह सर्वांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सुप्रिया स्टेजकडे येताना अजित पवारांच्या नावाच्या घोषणांनी अवघा आसमंत दणाणला. तेव्हा भुजबळ म्हणाले की, सुप्रिया सुळेंनी सर्वप्रथम सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणार नसल्याची घोषणा केली. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून महाविकास आघाडीनेही सुनेत्राताईंना पाठिंबा दिला. आपल्याला अश्रू पुसायचे आहेत. सुनेत्रा पवारांना निवडून आणण्याचा निर्धार करायचा आहे, असे भुजबळ म्हणाले.
वाढत्या तापमानामुळे ‘मेगा एल निनो’ची धास्ती
नवी दिल्ली/पुणे : यंदाचे तापमानवाढीचे वर्ष असून एल निनोचा परिणामही दिसणार आहे. त्यामुळे या वर्षी पर्जन्यमान सरासारीपेक्षा कमी राहणार आहे. तसेच या वर्षीचा उन्हाळा अतितीव्र असण्याची शक्यता आहे. त्यातच एलनिनोबाबत तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. १८७७ नंतरची सर्वात शक्तिशाली म्हणजेच मेगाएल निनोची प्रक्रिया होत आहे. १८७७ चा मेगा एल निनोच्या परिणामामुळे जगभरात उष्णतेच्या लाटा, दुष्काळ […] The post वाढत्या तापमानामुळे ‘मेगा एल निनो’ची धास्ती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
युसूफ पठाणच्या सास-यासह मेहुणा अटकेत
मुंबई : प्रतिनिधी किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद कसा गंभीर मारहाणीपर्यंत जाऊ शकतो, याचे धक्कादायक उदाहरण मुंबईत समोर आले आहे. माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण यांच्या नातलगांचा या प्रकरणात समावेश असून त्यांच्या सास-यासह मेहुण्याला पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्यावर पाणी साचलेले असताना एक कार त्या पाण्यातून गेली आणि उडालेल्या पाण्याचे शिंतोडे युसूफ खान नावाच्या […] The post युसूफ पठाणच्या सास-यासह मेहुणा अटकेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिला आरक्षणावरून लोकांची दिशाभूल; अडीच वर्षापूर्वीच बिल पास
मुंबई : प्रतिनिधी महिला आरक्षण विषय घेत लोकांची दिशाभूल करायची हे भाजपने ठरवले आहे. त्यासाठी ते आंदोलन करत आहेत. ५ राज्यांतील निवडणुकीत याचा फायदा व्हावा यासाठी हे सर्व काही सुरू आहे, असे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. महिला आरक्षणाच्या आडून भाजपकडून सर्व राजकारण सुरू आहे. हे सर्व जनतेच्या लक्षात येऊ लागले […] The post महिला आरक्षणावरून लोकांची दिशाभूल; अडीच वर्षापूर्वीच बिल पास appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लग्न जुळेना, तरुणाची नैराश्यातून आत्महत्या
बुलडाणा : प्रतिनिधी बुलडाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे एका तरुणाने टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपवले आहे. धक्कादायक म्हणजे भूमिहीन व अत्यंत गरीब कुटुंबात वाढलेल्या तरुणाने लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेने तरुणाच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून […] The post लग्न जुळेना, तरुणाची नैराश्यातून आत्महत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
घरफोडीचे १० गुन्हे उघड; ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड : प्रतिनिधी घरफोडी करणारी ६ जणांची टोळी भाग्यनगरच्या गुन्हे शोध पकडली आहे. यात एका विदेशी संघर्ष बालकाचाही समावेश आहे. या टोळीकडून पोलिसांनी १० घरपोडीचे गुन्हे उघड करून जवळपास ७८ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरात गेल्या काही दिवसापासून घरपोडीचे सत्र सुरू होते. काही दिवसापूर्वी फरांदे नगरात चोरी करून पळणाऱ्या चोरट्यांचा व्हिडिओ […] The post घरफोडीचे १० गुन्हे उघड; ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तिहेरी खून प्रकरणातील आरोपी शाहरुख कबूतर व उबेद गजाआड
नांदेड : प्रतिनिधी शहरात ४ एप्रिल रोजी घडलेल्या तिहेरी खून प्रकरणातील फरार आरोपी शाहरुख कबूतर व उबेद यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात अटक केली आहे, अशी माहिती पत्र परिषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली. भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ई-स्क्वेअर जवळ ४ एप्रिल रोजी तिहेरी हत्याकांड घडले होते. […] The post तिहेरी खून प्रकरणातील आरोपी शाहरुख कबूतर व उबेद गजाआड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तिरुनेलवेली : भाजपने देशातील अल्पसंख्याकांना धमकावले, भयभीत केले. मणिपूर पेटवून दिले. परंतु, आपला पक्ष द्वेष पसरू देणार नाही असे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या जनतेला दिले. मी भारत जोडो यात्रा केली आहे. माझे व पक्षाचे ध्येय एकसंध आणि सलोख्याच्या भारताचे आहे, असे ते म्हणाले. अण्णाद्रमुक पक्षात पूर्वी महान नेते होते, ज्यांनी तामिळनाडूच्या […] The post भाजपने मणिपूर पेटवून दिले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आज जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र, याचा फटका बसला आहे नव वधू-वराला. 'लग्नात विघ्न' अशी आपल्याकडे म्हण आहे, याचा प्रत्यय आला आहे सोलापूरच्या बार्शी येथून आलेल्या वधू पक्षाला. कर्मचारी संपावर गेल्याने सोलापूर येथून आलेल्या वधू-वराला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. दीड महिना नोटीस देऊन देखील ठरलेल्या दिवशी गेलेल्या वऱ्हाडाला कार्यालयात ताटकळत बसावे लागले असून नियोजित वेळेत विवाह नोंदणी होऊ शकलेली नाही. अकोल्याची हर्षा आणि सोलापूरच्या बार्शी येथील रविकांत लांडे यांचा विवाह नोंदणी पद्धतीने करण्यासाठी दीड महिना आधीच अर्ज करून आजची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र लग्नासाठी 50 वऱ्हाडी अकोल्यात दाखल झालेले असतानाच, दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी संपावर असल्याने या विवाह नोंदणीत मोठा अडथळा निर्माण झाला. नियोजित दिवशी लग्न होऊ न शकल्याने हताश झालेल्या वधू आणि वर पक्षाकडील मंडळींनी अखेर अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले तरी देखील विवाहाची नोंदणी न झाल्याने हे लग्नच अद्याप होऊ शकलेले नाही. त्यामुळे वधू-वर पक्षातील 60-70 वऱ्हाडी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ताटकळले आहेत. या वऱ्हाडींमध्ये काही लहान मुले देखील असल्याने त्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे लग्नात विघ्न ही म्हण या ठिकाणी खरी ठरल्याची चर्चा होत आहे. आता यावर नेमका तोडगा काय निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ राज्यातील सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला असून, यात एकट्या ठाणे जिल्ह्यातील 12 हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे शाळा-महाविद्यालये, शासकीय रुग्णालये आणि प्रशासकीय कामकाजाला मोठा फटका बसला असून, जोपर्यंत मागण्यांची योग्य अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच ठेवण्याचा इशारा कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळे यांनी दिला आहे.
नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती आहेत. बनावट खात्यांमधून 57 लाख 90 हजारांची फसवणूक झाली आहे. खरातसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली आहे. बाळासाहेब पाटील म्हणाले, नाशिकच्या सिन्नरमध्ये जगदंबा माता बिगर शेती ग्रामीण पतसंस्था आहे. या पतसंस्थेत 32 लोकांनी, या लोकांना माहीत नव्हते की खरातने त्यांच्या नावावर खाती उघडली आहेत. या संदर्भातील संपूर्ण कागदपत्र अहिल्यानगर येथून प्राप्त झाली होती. त्यात खाती ओपन केलेली आहेत. त्यांना समक्ष बोलावले आहे. तपासात किती ट्रान्सॅक्शन झाले आहे, प्रत्येकाचे खाते कधी ओपन झाले आहे, त्या संदर्भातले मेसेजेस कुठे जात होते, याची संपूर्ण चौकशी तपासात केली जाणार आहे. या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) लक्ष घातले आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने जगदंबा पतसंस्थेवर छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारांचे पुरावे मिळाल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवत तपासाचा फास आणखी आवळला आहे. त्यामुळे केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर केंद्रीय यंत्रणाही या प्रकरणात सक्रिय झाल्या आहेत. दरम्यान, अशोक खरातचे ठाणे कनेक्शन समोर आले आहे. ठाण्यातील निवृत्त सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर कार्यालयातील महिला क्लर्कवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप आहेरवर आहे. इतकेच नव्हे तर व्हिडिओ व्हायरल करून वारंवार अत्याचार देखील त्याने केल्याचा आरोप आहे. ठाण्यातील कासर वडवली पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे.
औंढा नागनाथ येथे पदोन्नतीच्या कारणावरून बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेस शिवीगाळ करून शासकिय कामास मज्जाव करणाऱ्या अंगणवाडी मदतनीसवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सोमवारी ता. २० सायंकाळी अदखलपात्र गुुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील अंगणवाडीमध्ये मागील १० वर्षापासून कल्पना यंबल ह्या मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पदोन्नतीसाठी पात्रताधारण केल्यांनतर काही दिवसांपुर्वी पदोन्नतीचा प्रस्ताव औंढा नागनाथ बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेकडे पाठविला होता. यावेळी अधिकाऱ्यांनी औंढा नागनाथ तालुक्यात पदोन्नतीसाठी पद रिक्त झाल्यानंतर तातडीने पदोन्नती दिली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे यंबल यांना जागा रिक्त होण्याची प्रतिक्षा लागली होती. दरम्यान, सोमवारी ता. २० दुपारच्या सुमारास बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात प्रकल्प अधिकारी संगीता इंगळे ह्या काम करीत बसल्या होत्या. यावेळी अंगणवाडी सेविका कल्पना तेेथे आल्या त्यांनी मला पदोन्नती का देत नाही असे म्हणत त्यांच्यासोबत वाद सुरु केला. यावेळी प्रकल्प अधिकारी इंगळे यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. जागा रिक्त झालेली नाही त्यामुळे थोडे थांबा असे म्हटल्यानंतर कल्पना यांनी शिवीगाळ करण्यास सुरवात केली. या प्रकारामुळे कार्यालयात एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यावेळी कल्पना यांनी प्रकल्प अधिकारी संगिता इंगळे यांना शिवीगाळ करून काम करण्यास मज्जाव केला. या प्रकरणी संगिता इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिसांनी कल्पना यंबल यांच्या विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. जमादार पठाण, दिलीप नाईक पुढील तपास करीत आहेत.

30 C