शहराचा पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या २,७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेने सोमवारी (२३ मार्च) ऐतिहासिक टप्पा ओलांडला. रात्री ८ वाजेच्या सुमारास जायकवाडी धरणावर ३,७०० अश्वशक्ती क्षमतेच्या महाकाय पंपाची चाचणी यशस्वी झाली असून, २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीत शास्त्रोक्त पद्धतीने पाणी सोडण्यात आले आहे. पहिल्या दिवशी दीड किलोमीटरपर्यंतच्या जलवाहिनीची चाचणी पूर्ण झाली असून मंगळवारी (२४ मार्च) ९ किलोमीटरपर्यंत पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. गुढीपाडव्याला सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये पाणी घेण्यात आले होते, त्यानंतर सोमवारी शक्तिशाली पंपाद्वारे मुख्य जलवाहिनीत पाण्याचा प्रवाह सुरू झाला. ३८ किलोमीटर लांबीच्या या पाइपलाइनमध्ये एकूण १२ कव्हर व्हॉल्व्ह बसवण्यात आले आहेत, ज्याद्वारे पाइपलाइनमधील घाण आणि कचरा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. देशातील सर्वात मोठी पाणीपुरवठा योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. या यशस्वी चाचणीवेळी मनपा आयुक्त जी. श्रीकांत, मजीप्राच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, जीव्हीपीआर कंपनीचे महाव्यवस्थापक महेंद्र गोगुलोथू व तांत्रिक अधिकारी उपस्थित होते. ही प्रक्रिया पूर्ण होताच नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचेल, ज्यामुळे शहराला दररोज २०० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. काय असतो कव्हर व्हॉल्व्ह ? पाणी सोडण्याआधी शुभारंभ करताना आयुक्त, जलवाहिनीत आलेले पाणी. पुढील महिनाभर चालणार जलवाहिनी स्वच्छतेचे काम पंपाची चाचणी यशस्वी झाल्याने आता जलवाहिनीच्या अंतर्गत स्वच्छतेच्या कामाला वेग येईल. नवीन पाइपलाइनमधून शुद्ध पाणी शहरापर्यंत पोहोचवण्यापूर्वी ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अनिवार्य असते. साधारण महिनाभराच्या या प्रक्रियेनंतर नक्षत्रवाडी केंद्रात पाणी पोहोचण्यास सुरुवात होईल. नवीन पाणीपुरवठा योजनेचा एक टप्पा पुढे; २५०० च्या जलवाहिनीत अखेर आले पाणी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या ३८ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनमध्ये एकूण १२ कव्हर व्हॉल्व्ह (ज्याला तांत्रिक भाषेत स्कोअर व्हॉल्व्ह म्हटले जाते) बसवण्यात आले आहेत. नवीन जलवाहिनीत असलेला कचरा, माती किंवा बांधकामाचे अवशेष बाहेर काढण्यासाठी या व्हॉल्व्हचा वापर होतो. याद्वारेच पूर्ण पाइपलाइन स्वच्छ करून शुद्ध पाणी शहरापर्यंत पोहोचवले जाते. १४ एप्रिलपर्यंत शहरात पाणी आणण्याचे प्रयत्न १४ एप्रिलपूर्वी शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी आणण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी दीड किलोमीटरची चाचणी यशस्वी झाली असून, मंगळवारी ९ किलोमीटरपर्यंत पाणी आणण्याचे नियोजन आहे. शहरवासीयांची २५ वर्षांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.” -जी. श्रीकांत, आयुक्त, मनपा.
केंद्र सरकारने हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट आणि दुग्धशाळांसाठी व्यावसायिक सिलिंडरचा कोटा 20 टक्क्यांनी वाढवून 50 टक्क्यांपर्यंत नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही. प्रत्यक्षात बुकिंग कधीपासून सुरू करायचे? त्याची मर्यादा किती दिवसांची असावी? याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्याकडून आलेल्या नाहीत. त्यामुळे कंपन्यांकडून व्यावसायिक सिलिंडरचा कोटा एजन्सीसाठी अद्याप रिलीज करण्यात आलेला नाही. शासनाच्या मार्गदर्शक सूचना नसल्याने व्यावसायिक वर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. सोमवारी, व्यावसायिक सिलिंडर वितरणासंबंधी पुरवठा विभागाची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यात सोलापुरातून जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे आणि शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे सहभागी झाले होते. भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपन्यांकडे सिलिंडरचा साठा असूनही वितरण प्रक्रिया ठप्प असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी शहरातील सर्वच एजन्सींच्या बाहेर आणि त्यांच्या गोदामांत ग्राहकांच्या रांगा होत्या. तिथे सूचना फलक लावण्यात आले होते. काही ठिकाणी ग्राहक आणि एजन्सीधारक यांच्यात वादही पाहायला मिळाले. एजन्सींच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घरगुती गॅस ग्राहकांना दिलासा देण्यासाठी 23 मार्चपासून बुकिंगनंतर 96 तासांच्या आत सिलिंडर घरपोच करण्याचे लेखी आदेश सर्व गॅस एजन्सींना दिले आहेत. त्याचा अंमल सोमवारपासून सुरू झाला. परंतु ग्राहकांनी सिलिंडर मिळवण्यासाठी सकाळपासूनच गॅस एजन्सींच्या बाहेर रांगा लावल्या. त्यांना पुढील 4 दिवसांत पुरवठा सुरळित होईल, असे सांगण्यात आले. उद्योगांना सिलिंडर देण्यात संभ्रम रेस्टॉरंट, ढाबे, हॉटेल्स, अन्नप्रक्रिया, दुग्धव्यवसाय, सामुदायिक स्वयंपाकघरे, स्थलांतरित मजुरांसाठी 5 किलो एफटीएल यांसारख्या क्षेत्रांना शासन निर्णयाने दिलासा मिळाला असला तरी, लघु आणि मोठ्या उद्योगांना व्यावसायिक सिलिंडर पुरवण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. यामुळे अनेक उद्योजकांचे काम गॅसअभावी रखडले आहे. शासनाच्या सूचनेनंतरच वितरण व्यावसायिक सिलिंडर वितरणाबाबत केंद्र सरकारने कोटा वाढवला आहे. परंतु राज्य सरकारकडून त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना अद्यापही मिळालेल्या नाहीत. त्या मिळाल्या की प्रत्यक्षात व्यावसायिक गॅसची बुकिंग सुरू करण्यात येईल. त्यानंतर वितरण होईल. ओंकार पडोळे, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर
विधिमंडळ कामकाजात आज विधानपरिषदेचे सदस्य उद्धव ठाकरे यांच्यासह 9 सदस्यांचा निरोप समारंभ पार पडणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्याविषयी निरोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून काय बोलले जाते याकडे लक्ष असणार आहे. विधिमंडळ कामकाजाचे अपडेट पाहण्यासाठी लाईव्ह ब्लॉग पाहा
सायंकाळच्या वेळी हॉटेलमध्ये येऊन टोळक्यासह तब्बल 14 हजारांची दारू प्यायली. मात्र बिल देण्याची वेळ आल्यावर येथे अमराठी कामगार चालत नाही असे म्हणत मॅनेजरच्या कानशिलात लगावली, तर एकाने तलवार काढून दहशत पसरवली. शनिवारी (21 मार्च) रात्री 10 वाजेच्या सुमारास हॉटेल काबरूमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी विकास रहाटवाडे, सारंग तरमगे व दोन अनोळखी व्यक्तींवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश कांतीलाल गोलेच्छा (29, रा. राजाबाजार) यांनी फिर्याद दिली. ते दोन महिन्यांपासून लिंक रोडवरील काबरू हाऊस हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत. 21 मार्चला दुपारी 1 वाजता ते कामावर गेले. त्याच रात्री 10 वाजता आरोपी विकास रहाटवाडे, सारंग तरमगे आणि अनोळखी दोन, असे चौघे हॉटेलमध्ये आले. त्यांनी दारूची मागणी केली. आकाश यांनी त्यांना दारू दिली. एकाने दारू घेतल्यानंतर तिघांनी लगेच येथे अमराठी कामगार चालणार नाहीत, असे म्हणून दादागिरी सुरू केली. एकाने तेवढ्यात तलवार काढली आणि सर्वत्र फिरवली. यामुळे इतर ग्राहकांमध्येही दहशत पसरली. या आरोपींनी आकाशला धमकावून माफी मागायला लावले. यानंतर येथे कामाला यायचे नाही, असे धमकावत जिवे मारण्याची धमकी दिली. तेवढ्यात एकाने हॉटेल मालक रमण कपूर यांना बोलावले. ते आल्यावर आरोपींपैकी एक जण त्यांना बोलला आणि ते दारूचे 14 हजार 333 रुपये बिल न देता कारने (एमएच 20, ईएक्स 1431) निघून गेले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे करीत आहेत. हायप्रोफाइल व्यक्तींकडून वसुलीसाठी नित्याचाच स्टंट सध्या शहरात पैठण रोड झपाट्याने वाढणारा परिसर आहे. त्या ठिकाणी अनेक गुंडांचा वावर वाढला आहे. गेल्या दोन महिन्यांत लिंक रोडवर अनेकांना लुटण्याचे प्रकार समोर आले आहे. या नवीन भागात आपलीच ‘हवा’ असावी यासाठी अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या हॉटेलमध्ये हायप्रोफाइल लोक पार्टीसाठी जातात, त्याच ठिकाणी दहशत माजवून वसुली सुरू करण्यासाठी थेट सीसीटीव्हीच्या समोर त्याने तलवार नाचवत राडा केला. हॉटेलमध्ये तब्बल 13 मिनिटे सुरू होता थरार हॉटेलमध्ये मॅनेजरने बिलाची मागणी केली. त्यामुळे थेट त्याच्या कानशिलात लगावून त्याने तलवार नाचवण्यास सुरुवात केली. हा थरार जवळपास 13 मिनिटे सुरू होता. त्यामुळे हॉटेलमधील इतर ग्राहकही भयभीत झाले होते.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणासोबतच आता त्याच्या आर्थिक फसवणुकीचे नवनवीन आणि धक्कादायक पैलू समोर येत आहेत. चिंचुके आणि बनावट खडे विक्रीच्या प्रकरणांनंतर, आता त्याने 'तुर्की मध' विकण्याच्या नावाखाली अनेक भाविकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याची खळबळजनक माहिती पोलिस तपासातून उघड झाली असून, या आर्थिक घोटाळ्याचे धागेदोरे आता अधिक खोलवर पसरल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा 'तुर्की मध' कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा खोटा दावा करून श्रीमंत उद्योजक व राजकीय नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढत असे. लैंगिक समस्यांवरील प्रभावी उपाय म्हणून या मधाची एका किलोची बाटली तो तब्बल 9 लाख रुपयांच्या अव्वाच्या सव्वा दराने विकत असल्याची खळबळजनक बाब आता पोलिस तपासातून उघड झाली आहे. अशोक खरात या मधाला 'एल्विश हनी' असे नाव देऊन तो तुर्कीतील समुद्राच्या खोल गुहांमधून मिळवलेला अत्यंत दुर्मिळ प्रकार असल्याचा बनाव रचत होता. या कथित दुर्मिळतेचा आधार घेत तो भाविकांचा विश्वास संपादन करून मधाची लाखो रुपयांना विक्री करत असला, तरी प्रत्यक्षात हा सर्व प्रकार निव्वळ फसवणूक आणि बनावटगिरी असल्याची दाट शक्यता आता पोलिस तपासातून समोर येत आहे. या गैरप्रकारांतून मिळालेली कोट्यवधींची अफाट रक्कम अशोक खरात आपल्या ट्रस्टच्या खात्यात वळवत असल्याचे उघड झाले असून, या व्यवहारांच्या आधारे काळा पैसा पांढरा करण्याचा गंभीर प्रकार झाल्याचा संशय आता तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. चिंचोके, बनावट खडे, तांत्रिक विधी आणि महागड्या मधाच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या अंधश्रद्धेचा तसेच वैयक्तिक अडचणींचा गैरफायदा घेत खरातने हे अवाढव्य आर्थिक जाळे विणल्याचे आता स्पष्ट होत आहे. अध्यात्माच्या नावाखाली वासनेचा बाजार!:भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश? खळबळजनक माहिती समोर अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपत असून, त्याला दुपारी 2 वाजता नाशिक सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, आजच्या सुनावणीत पोलिस न्यायालयात कोणती बाजू मांडतात आणि त्याच्या कोठडीत वाढ होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या भोंदूबाबाच्या काळ्या कारनाम्यांचे पितळ नेमके कसे उघडे पडले, याचे सविस्तर तपशीलही आता समोर आले आहेत. वाचा सविस्तर
येथील राजस्थानी गौड ब्राह्मण महिला मंडळांद्वारे गणगौरच्या पावन पर्वानिमित्त गणगौर पूजन करत शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा नुकतेच शहरातील विविध भागातून काढण्यात आली. या शोभा यात्रेची सुरुवात राजस्थानी ब्राह्मण भवन बारादरी येथून करण्यात आली. ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांनी मार्गक्रमण करीत नटराज गार्डन पर्यत काढण्यात आली. या ठिकाणी शोभा यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी राजस्थानी गौड ब्राह्मण महिला मंडळांद्वारे विविध कार्यक्रम घेण्यात आले. याकरिता मंडळाच्या शारदा शर्मा, नीता गौड, गौरजा शर्मा, सुजाता शर्मा, यांचे मार्गदर्शन लाभले. या उत्सवाच्या यशस्वितेसाठी मंडळाच्या अध्यक्षा मंजू बोहरा, स्नेहा शर्मा, शांती शर्मा, सुनीता शर्मा, अंकिता बोहरा, सरला शर्मा, माया शर्मा, नंदा शर्मा, मनीषा लोसल्या, नेहा जोशी सह सर्व महिला मंडळाने अथक परिश्रम घेतले.
आपल्या मनातील ताणतणाव आणि अहंकाराची लंका' जाळण्यासाठी हनुमंतासारखी जागरूकता आणि गजानन महाराजांसारखी साक्षीवृत्ती' अंगी बाळगणे काळाची गरज आहे. जेव्हा आपण स्वतःला मी' म्हणून मोठे करतो, तेव्हा संकटाचे तोंडही मोठे होते; पण जेव्हा आपण ‘मी' पणाचा त्याग करून लघुरूप (नम्र) होतो, तेव्हा कोणत्याही संकटाच्या मुखातून सुरक्षित बाहेर पडू शकतो, असे प्रतिपादन रामकथाकार डॉ. भूषण फडके यांनी केले. नीलेश देव मित्र मंडळातर्फे आयोजित संगीतमय श्रीरामकथा' महोत्सवाच्या चौथ्या पुष्पात मार्गदर्शन करताना डॉ. फडके बोलत होते. त्यांनी सुंदरकांड' आणि युद्धकांडा'तील व्यवस्थापन सूत्रांवर निरूपण केले. कथेत हनुमानाचे समुद्र उल्लंघन, सीता शोध, रावण-हनुमान संवाद, लंकादहन, बिभीषण शरणागती, सेतुबंधन आणि अंगद शिष्टाई या प्रसंगांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. डॉ. फडके यांनी हनुमंताच्या कार्याला शेगावचे संत गजानन महाराज यांच्या आध्यात्मिक शिकवणुकीची जोड दिली. भक्ती, शक्ती आणि चातुर्य यांचा त्रिवेणी संगम म्हणजे वीर हनुमान, तर शक्ती आणि अहंकार यांचे प्रतीक म्हणजे रावण. हनुमंताने समुद्र ओलांडताना स्पर्श करून मैनाक पर्वताचा आदर केला; पण ते तिथे विश्रांतीसाठी थांबले नाहीत. गजानन महाराज नेहमी म्हणायचे, उपाधीत अडकू नका; संसारात मान-सन्मान मिळतील, पण त्यात न अडकता आपले ध्येय' (रामकार्य) विसरू नये’. हाच महाराजांचा आणि हनुमंताचा संदेश आहे. हनुमंतासमोर जेव्हा सुरसेसारखी संकटे आली, तेव्हा त्यांनी बुद्धीचा वापर केला. डॉ. फडके म्हणाले की, महाराजांचा गण गण गणात बोते' हा मंत्र शिकवतो की, प्रत्येक जीवात तोच परब्रह्म आहे. समोरचा आदरातिथ्य करत असेल तर नम्र व्हा; अहंकारी असेल तर सूक्ष्म व्हा आणि ध्येयाच्या आड येत असेल (सिंहिका राक्षसीप्रमाणे), तर तिथे धर्माचा प्रहार करायला मागे हटू नका, असेही ते म्हणाले. सोहळ्यात विविध भक्तीगीतांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. देवाशिष फडके याने सेतुबंध रे सागरी', हे राम हे राम तर निखील देशमुख यांनी पेटवी लंका हनुमंत, विश्वाचा विश्राम रे, सुग्रीव हे साहस असले, वैशाली फडके यांनी, गजाननच्या चरणी जुळवू या आपुले नाते, श्रीराम गजर तर सुमंत तरालकर यांनी अविरत ओठी हि गीते सदर केली. गण गणात बोते या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. हार्दिक दुबे आणि विग्नेश बोकसे यांनी साथ सांगत केली. प्रभु रामचंद्र हे नेतृत्वगुणांचे उत्तम उदाहरण सेतुबंधनाच्या प्रसंगावर बोलताना डॉ. फडके म्हणाले की, पाच दिवसांत सेतू उभा राहणे असामान्य आहे. प्रभू रामचंद्रांनी सामान्य वानरांकडून असामान्य कार्ये करून घेतली. हे नेतृत्वगुणांचे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले. गजानन महाराज आपल्याला शिकवतात, तुम्ही फक्त निमित्त व्हा, कार्य करणारा तो वर बसलेला राम आहे'. जसा नलाचा हात आणि रामाचे नाव लागून सेतू बांधला गेला. तसेच महाराजांचा आशीर्वाद आणि आपले कष्ट एकत्र आले की संसाराचा अथांग सागर ओलांडणे कठिण राहत नाही, असेही नमूद केले. लंका म्हणजे मनातील नकारात्मकता लंका म्हणजे मनातील नकारात्मकता-भिती, राग आणि अहंकार आहे, असे डॉ. फडके यांनी लंकादहनाचा प्रसंग विशद करताना सांगितले. हनुमंत हे इनर पॉवर अॅक्टिव्हेशनचे प्रतीक आहेत. हनुमंताने रावणाच्या दरबारात दाखवलेले बुद्धीचातुर्य हे विलक्षण होते. रावणाने जेव्हा शेपटी पेटवली, तेव्हा हनुमानाने त्याच अग्नीने सोन्याची लंका भस्मसात केली. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक लंका आहे, पण आपल्या आतही एक हनुमान आहे जो जागरूकतेने त्या लंकेला जाळू शकतो, असेही डॉ. फडके यांनी नमूद केले.
भोंदूबाबा अशोक खरात याच्यामुळे अडचणीत आल्याने राजीनामा देऊन मुक्त झालेल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महिला काँग्रेसने केली आहे. अमरावती शहर काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष जयश्री वानखडे यांच्या नेतृत्वात आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी त्यांच्या छायाचित्राला चपलेने बडवण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात याने तंत्र-मंत्र विद्या व दैवी शक्तीचा हवाला देत काही महिलांवर अत्याचार केला आहे. या घटनेचे जिवंत पुरावे पुढे आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यानच्या काळात चाकणकर यांनी अशोक खरात याची पाद्यपूजा केल्याचेही पुढे आले. एवढेच नव्हे तर त्यांचा खरात यांच्या संस्थेतही सहभाग असल्याचे सिद्ध झाले. यामुळे त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. मात्र हे प्रकरण केवळ एवढ्यावर संपत नाही, असे म्हणत काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन फसवणुकीच्या अनेक प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याच मागणीसाठी सोमवारी महिला काँग्रेसने जिल्हा कचेरीसमोर निदर्शने करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात महिला काँग्रेसच्या इतर पदाधिकारी नगरसेविका डॉ. अर्चना आत्राम, राजश्री जठाळे व मालती गवई यांच्याशिवाय आरती पिंपळे, वंदना निर्गुडे, सीमा तिवारी, शेख शाहीन, किरण चांदवकर, आरती क्षीरसागर आदी सहभागी झाल्या होत्या.
देशभरात लवकरच सुरू होणाऱ्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत सोमवारी २३ रोजी जनगणना तयारीसंदर्भात सविस्तर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जनगणनेच्या सर्व टप्प्यांवरील तयारीचा व्यापक आढावा घेण्यात आला असून प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन व उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त सौम्या शर्मा उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना डिजिटल अॅपच्या मदतीने नोंदी घेण्याते निर्देश दिले. यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्तांनी जनगणनेचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व अधोरेखित केले. यावर्षीची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने, मोबाईल ॲपच्या माध्यमातून पार पडणार असल्याने प्रशिक्षण घेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाची सखोल माहिती आत्मसात करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच डिजिटल प्रणालीमुळे काम अधिक वेगवान व अचूक होणार असले तरी त्यासाठी सजगता व तांत्रिक कौशल्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. जनगणना ही कायद्याच्या अधीन असलेली प्रक्रिया असल्याने प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती देणे बंधनकारक आहे. नागरिकांकडून माहिती संकलित करताना विश्वास निर्माण करणे, योग्य मार्गदर्शन करणे तसेच माहितीची गोपनीयता कायम राखणे याबाबत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. जनगणना ही केवळ शासकीय उपक्रम नसून देशाच्या भवितव्याशी निगडित अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे या कार्यात सहभागी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे व गांभीर्याने काम करावे, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले. या बैठकीत उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भुषण पुसतकर, नितीन बोबडे, धनंजय शिंदे, मनोज शहाळे, उद्यान अधिक्षक अजय विंचुरकर, सहाय्यक निवडणुक अधिकारी अक्षय निलंगे, कैलास कुलट, मनपा कर्मचारी उपस्थित होते. अचूक नोंदी घेण्याचे निर्देश १६ वर्षांनंतर होत असलेली ही जात निहाय जनगणना देशाच्या सामाजिक, आर्थिक व लोकसंख्यात्मक स्थितीचे अद्ययावत चित्र समोर आणणार असून भविष्यातील विकास आराखडे, पायाभूत सुविधा, कल्याणकारी योजना व विविध धोरणे निश्चित करण्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण ठरणार आल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
श्री राम नवमीनिमित्त रामायण कथा:अंबागेटच्या दत्त मंदिरात रामकथेची अमृतधारा; उपस्थित भाविक मंत्रमुग्ध
प्रभू श्री रामांच्या अभिषेकाची तयारी अयोध्या नगरीत सुरू असताना माता कैकेयीच्या वचनाने अनर्थ ओढवला. पण, मातेच्या अप्रिय वचनांनी दुःखी न होता तिची इच्छा आणि पित्याचे वचन पूर्ण करण्यासाठी श्रीराम आनंदाने वनवासाला निघाले. कौसल्या मातेला त्यांनी समजावले. रागावलेल्या बंधूची, विशेषत: लक्ष्मणाची, त्यांनी समजूत घातली. केवळ तुच्छ राज्यासाठी यश आणि कीर्तीला कलंक लावणे श्री रामांना मान्य नसल्याचेच यातून अधोरेखित होते. श्री वाल्मिकी विरचित रामायणातील श्रीराम चरित्र नित्य शिरोधार्ह, पूजनीय असल्याचे रामकथेतील प्रत्येक भागाचा उलगडा करताना प्रा. डॉ. अलका बेडेकर यांनी सांगितले. जनकल्याण सेवा संस्थेद्वारे संचालित अंबागेटच्या आतील दत्त मंदिराजवळ डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे होमिओ व सुजोक उपचार केंद्र रुग्णसेवा सदनात आहे. याच वास्तूत श्री राम नवरात्रात (चैत्र नवरात्र) डॉ. बेडेकर यांच्या वाल्मिकी रामायणाचा श्रीगणेशा झाला आहे. त्या सुरेख रामकथा भाविकांना सांगत आहेत. अयोध्या कांड विशद करताना डॉ. बेडेकर म्हणाल्या, सर्वगुणसंपन्न श्री राम प्रजेसह सर्वांचेच लाडके आहेत. त्यांच्या अभिषेकासाठी अयोध्या नगरी सजली आहे. प्रजा आनंदित आहे. अशा आनंदी वातावरणात विष मिसळावे तसा प्रकार घडला. महाराणी कैकेयीला तिची दासी मंथरा म्हणते, श्री रामांचा अभिषेक होतो आहे. नगरी सजली आहे. तेव्हा कैकेयी आनंदित होते. मंथरेला बक्षीस देत ती म्हणते की, ही अमृतवार्ता आहे. मात्र, मंथरा पुढेही कैकेयीचे मन कलुषित करते. भरत आणि राम यांच्याविषयी कैकेयी भेद करीत नाही. रामाला राज्य मिळाले तरी ते भरताला मिळाल्यासारखेच आहे, असे ती म्हणते. त्यावर मंथरा विलक्षण युक्तिवाद करते. ती म्हणते, पुढच्या पिढीतही राज्य रामाच्या मुलांना मिळेल. लक्ष्मण सतत सोबत असल्याने त्याला काहीतरी मिळेल. पण, भरत सतत मामाकडे असल्याने त्याला काय देणार? माते, तू भरताला अयोध्येला बोलावून घे. त्यानंतर प्रसन्नचित्त श्री रामांनी पित्याला प्रदक्षिणा घालून माता कौसल्येच्या महालाकडे निघतात, असे सुरेख वर्णन रामकथेतील अयोध्या कांड सांगताना डॉ. बेडेकर यांनी केले. श्री राम कौसल्या मातेच्या महालात पोहोचल्यानंतर त्यांना म्हणतात मी दंडकारण्यात जाणार. सुखोपभोग नाकारून मी कंदमुळे खाणार. पण, श्रीरामा तू वनात जाणार तर मी तरी येथे कशी राहू ? तू राजा होऊ नकोस. परंतु, पुत्र धर्माचे पालन तर कर. त्यावर श्रीराम म्हणतात मी वनातून आलो की तुझी सेवा करीन. एवढे बोलून श्री राम माता सुमित्रेच्या महालात जातात. वनवासाविषयी ऐकताच लक्ष्मण रागाने म्हणतो, दादा तुम्ही कोणताही अपराध केला नाही.तर मग तुम्हाला राज्याबाहेर कसे काढणार ? तुम्ही लगेच अभिषेक करून घ्या. मी सर्व विरोधकांचा पराभव करेन. लक्ष्मणा, तुझे प्रेम मी जाणतो. पण, धर्म मोठा आहे. तू मातापित्याची सेवा कर. धर्महिन राज्यासाठी आपल्या यशाला मागे कसे ढकलणार ? अधर्मपूर्वक मिळालेले या तुच्छ पृथ्वीचे राज्यही मला नको आहे, असे श्री राम ठामपणे सांगतात, असेही वर्णन रामकथेत करण्यात आले.
अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपत असून, त्याला दुपारी 2 वाजता नाशिक सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, आजच्या सुनावणीत पोलिस न्यायालयात कोणती बाजू मांडतात आणि त्याच्या कोठडीत वाढ होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या भोंदूबाबाच्या काळ्या कारनाम्यांचे पितळ नेमके कसे उघडे पडले, याचे सविस्तर तपशीलही आता समोर आले आहेत. अशोक खरातला आपल्या कृत्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची कुणकूण लागताच त्याने हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पीडित महिलांनी न्यायासाठी सुरुवातीला एका आमदाराची भेट घेऊन त्यांना सर्व आपबिती सांगितली होती, मात्र तिथे त्यांच्या पदरी निराशाच पडली. संबंधित आमदाराने पीडितांना मदत करण्याऐवजी उलट खरातलाच या तक्रारीची पूर्वसूचना दिली, ज्याचा फायदा घेत खरातने हे प्रकरण दाबण्यासाठी उलट पीडितेच्या पतीवरच गुन्हा दाखल करून त्यांना कायदेशीर कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या अन्यायापुढे हार न मानता पीडितांनी दुसऱ्या एका आमदाराची भेट घेतली, ज्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली. मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा प्रकार जाताच प्रशासकीय यंत्रणा वेगाने हलली आणि या संपूर्ण अत्याचारकांडाला वाचा फुटली. लोकप्रतिनिधींची खंबीर साथ आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळेच या भोंदूबाबाचे काळे कारनामे चव्हाट्यावर आले असून पीडितांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण:SITकडून पीडितांना समोर येण्याचे आवाहन, संपर्क क्रमांक केला जारी; ओळख गोपनीय ठेवण्याचे आश्वासन नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोककुमार एकनाथ खरात उर्फ 'कॅप्टन खरात' याच्या काळ्या कारनाम्यांविरुद्ध नाशिक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अशोक खरातवर आतापर्यंत ६ फौजदारी गुन्हे दाखल झाले असून, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, एसआयटीने आता पीडितांसह जनतेला समोर येण्याचे आणि तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. तसेच माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासनही पोलिसांकडून देण्यात आले आहे. वाचा सविस्तर
राठी नगर स्थित सरस्वती कॉलनी येथील श्री श्री रुक्मिणी आध्यात्मिक संस्कार केंद्र (इस्कॉन) अमरावती तर्फे विश्वविख्यात कीर्तन सम्राट, त्रिदंड संन्यासी परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनात आणि प्रेरणेने २७ मार्च रोजी श्री रामनवमी महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा श्री रामनवमी २६ मार्चला नसून २७ मार्च रोजी आहे, कारण त्या दिवशीच नवमी तिथी येत आहे. याच दिवशी श्री अयोध्या धाम येथेही श्री रामनवमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे, ही विशेष बाब आहे. गौडीय वैष्णव परंपरेमध्ये श्री चैतन्य महाप्रभु यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, भगवान हे एकच अद्वितीय परम तत्त्व असून ते विविध अवतारांद्वारे भक्तांशी लीला करतात. श्रीराम हे त्या परमेश्वराचे “मर्यादा पुरुषोत्तम” स्वरूप असून त्यांनी धर्म, सत्य आणि आदर्श जीवन कसे जगावे याचे प्रत्यक्ष उदाहरण दिले. महाप्रभू सांगतात की, श्रीराम हे ‘धर्माचे साक्षात प्रतीक’ आहेत. त्यांनी आपल्या जीवनातून सत्य, कर्तव्य आणि आदर्श राज्यकारभाराचे दर्शन घडवले. रामनामाचा जप केल्याने मन शुद्ध होते आणि व्यक्तीमध्ये सद्गुणांचा विकास होतो. सीतामाता या भगवती लक्ष्मींचे स्वरूप आहेत. महाप्रभूंच्या मते, त्या शक्ती म्हणजेच भगवंतांच्या आनंदशक्तीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या जीवनातून निःस्वार्थ प्रेम, सहनशीलता आणि परम भक्ती शिकायला मिळते. बंधू लक्ष्मणाने श्रीरामांची अखंड सेवा केली. महाप्रभूंच्या शिकवणीत “दास्य भाव” म्हणजेच सेवाभाव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. लक्ष्मण हे त्या दास्यभावाचे सर्वोत्तम उदाहरण आहेत. हनुमानजींना महाप्रभूंनी “परम भक्त” म्हणून गौरवले आहे. त्यांची भक्ती ही पूर्णपणे निःस्वार्थ आणि समर्पित आहे. त्यांनी कधीही स्वतःसाठी काही मागितले नाही, फक्त प्रभूची सेवाच केली. महोत्सवाची सुरुवात २७ रोजी पहाटे ४.३० वाजता श्री श्री रुक्मिणी द्वारकाधीश यांच्या मंगल आरतीने होईल. त्यानंतर “हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे” या महामंत्राचा सामूहिक जप होईल. सकाळी १० ते १०.३० या वेळेत भक्तवृंदाद्वारे हरिनाम संकीर्तन होईल. त्यानंतर १०.३० ते ११.३० या वेळेत श्रीराम कथा होईल. पुढे ११.३० ते १२.३० दरम्यान श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान यांचा महाअभिषेक होईल. दुपारी १२.३० ते १या वेळेत ५६ भोग दर्शन व महाआरती होईल. त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. या संपूर्ण महामहोत्सवाचा लाभ सर्व अमरावतीकरांनी घ्यावा, असे आवाहन इस्कॉन अमरावतीचे अध्यक्ष श्रीमान अद्वैत आचार्य प्रभुजी यांनी केले आहे.
चार दिवसांपुर्वी जिल्ह्यातील बहूतांश भागात ढगाळ हवामान होते, मध्यम व हलका पाऊससुध्दा पडला. काही भागात गारपिट झाली होती. त्यामुळे २० मार्चला जिल्ह्याचे कमाल तापमान ३३ अंशापर्यंत खाली उतरले होते. त्यानंतर तीन दिवस तापमान कमीच होते. मात्र सोमवारी (दि. २३) पुन्हा एकदा तापमानाने उसळी घेतल्याचे दिसत आहे. सोमवारी शहरात कमाल तापमान ३८.४ अंश नोंद झाले आहे. अवघ्या तीन दिवसात तापमानात पाच अंशाची वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उन्हाचे चटके जाणवायला लागले. यावर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच शहर व जिल्ह्यात उन्हाचे रौद्ररुप पहायला मिळाले. त्यामुळे अलीकडच्या काळात कधी नव्हे ते पहिल्यांदाच १२ मार्चला अमरावतीत तापमान ४२.२ अंशावर गेले होते. सलग दोन दिवस देशात अमरावतीचे तापमान सर्वोच्च ठरले होते. त्यामुळे मार्च महिन्यातच यंदा तापमानाची एप्रिल महिन्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र १९ व २० मार्चला जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले. काही भागात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्या कारणाने दोन ते तीन दिवस का होईला अमरावतीकरांना उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला होता. कारण २० मार्चला शहरातील तापमान ३३ अंशापर्यंत खाली आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून ढग निघून गेल्यामुळे वातावरण निरभ्र झाले. मात्र २१ व २२ मार्चला फारसे तापमान नव्हते. मात्र आता पुन्हा एकदा पारा झपाट्याने वाढताना दिसतो आहे. २२ ते २३ मार्च या चोविस तासातच पारा जवळपास १.६ अंशाने वाढला आहे. डॉ. प्रवीण कुमार, हवामान शास्त्रज्ञ, आरएमसी, नागपूर. २७ मार्चला पुन्हा ढगाळ वातावरण? सद्या वातावरण ढगाळ नाही. त्यामुळे पुन्हा तापमानात वाढ व्हायला सुरूवात झाली आहे. आणखी तीन ते चार दिवस तापमान वाढणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा २७ किंवा २८ मार्चला विदर्भ व परिसरात ढगाळ वातावरण तयार होण्याची परिस्थिती आहे. मात्र पावसाची शक्यता दिसत नाही. ढगाळ वातावरण तयार झाल्यास पुन्हा तापमान काहीसे कमी होईल.
संत्रा विक्रीसाठी जाणाऱ्या 2 व्यावसायिकांचा मृत्यू:मध्य प्रदेशातील छिंदवाड्याला जाताना घडली घटना
संत्रा विक्रीसाठी हिवरखेडवरुन निघालेल्या दोन तरुणांवर काळाने घाला घातला. मध्य प्रदेशातील घाटपिंपरीजवळ या तरुणांच्या मालवाहू वाहनाला विरुद्ध दिशेने आलेल्या मिनी ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत हिवरखेड येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना २२ मार्चला मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण हिवरखेड गावात स्मशान शांतता पसरली आहे. हिवरखेड येथील भूषण मधुकर तडस (३२) आणि प्रज्वल ज्ञानेश्वर चावके (२२) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांचे नावे आहेत. भूषण व प्रज्वल हे दोघे तरुण संत्रा विक्रीचा व्यवसाय करायचे. २२ मार्चला रात्री दहा वाजताच्या सुमारास ते प्रज्वलच्या मालकीच्या बोलेरो पिकअपमध्ये संत्र्याचे क्रेट भरून विक्रीसाठी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे निघाले होते. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांच्या केबिनचा अक्षरश: चुराडा झाला. यामध्ये भूषण आणि प्रज्वल या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. सोमवारी (दि. २३) सकाळी नातेवाईकांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोन्ही तरुणांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी छिंदवाडा येथील रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदन आटोपल्यानंतर सोमवारी दुपारी दोन्ही तरुणांचे मृतदेह हिवरखेड गावात आणण्यात आले. एकाच मोहल्ल्यातील दोन तरुण मुलांचे मृतदेह गावात पोहोचताच ग्रामस्थांचा कंठ दाटून आला. भुषण व प्रज्वल हे दोघेही गाव व परिसरातील शेतकऱ्यांकडून संत्रा खरेदी करायचे. तो संत्रा नेऊन मध्य प्रदेशातील छिंदवाडा किंवा अन्य शहरात विकायचे. दरम्यान रविवारी रात्रीसुध्दा ते संत्रा घेऊन जात होते. मात्र छिंदवाड्यात संत्रा विक्रीसाठी पोहचण्यापुर्वी अपघात झाला व या दोन्ही तरुण व्यावसायिकांवर काळाने झेप घेतली. काळाने घातली झडप
नवीन संशोधन आणि कल्पनांमधूनच राष्ट्राचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन, जीएलए विद्यापीठ, मथुराचे प्र-कुलगुरू डॉ. दुर्गसिंह चव्हाण यांनी केले. स्वामी चिंचोली येथे दत्त कला शिक्षण संस्था संचलित दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या वतीने ‘ट्रेंड्स इन मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग स्ट्रीम्स (टाइम्स-२०२६) विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक १३ व १४ मार्च रोजी पार पडली. दोन दिवस चाललेल्या या परिषदेत देश-विदेशातील ७५० संशोधक, प्राध्यापक, उद्योगतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच फिलिपाइन्समधील दक्षिण फिलिपाइन्स विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्या सहकार्याने हायब्रीड पद्धतीने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भारतासह फिलिपाईन्स, इंडोनेशिया आणि तैवान येथील संशोधकांनी परिषदेत सहभाग नोंदवला. परिषजेच्या उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. दुर्गसिंह चव्हाण म्हणाले, ‘ बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात संशोधन, नावीन्य आणि नवीन कल्पनांच्या आधारेच राष्ट्राचा विकास होणे शक्य आहे. विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक ज्ञानावर न थांबता प्रायोगिक ज्ञानालाही महत्त्व दिले पाहिजे , असे आवाहन त्यांनी केले. विश्वगुरू इन्फोटेक प्रा. लि. चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गंगार्डे यांनी ग्रामीण भागातून जागतिक स्तरावर प्रगती साधण्याचा प्रेरणादायी अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. “जिथे समस्या, तिथे अभियंता” असा संदेश देत त्यांनी तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. परदेशातील तज्ज्ञ वक्त्यांनी विविध आधुनिक विषयांवर मार्गदर्शन केले. पवनचक्की देखभालीसाठी रोबोट, स्मार्ट मोटर प्रणाली, जैवसंकेत विश्लेषण, मानवी दोन दिवसांत ५७० शोधनिबंध सादर दोन दिवसीय परिषदेत ५७० संशोधन निबंध सादरीकरण, तांत्रिक सत्रे, प्रश्नोत्तर सत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उत्कृष्ट संशोधन सादरकर्त्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली. परिषदेच्या आयोजनासाठी प्रा. एस. एस. काठाळे, डॉ. एस. एस. बेरे आणि डॉ. एन. पी. देशमुख यांनी संयोजक म्हणून काम पाहिले. सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने परिषद यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटी विरुद्ध संघर्ष करून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या हौतात्म्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली, म्हणून त्यांचे कार्य इतिहासात वंदनीय आहे, असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले. महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील इतिहास अभ्यास मंडळाच्या वतीने हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते. ते म्हणाले की, भगतसिंग बुद्धिमान, विचारशील क्रांतिकारक होते. त्यांनी दिल्लीच्या सेंट्रल असेंम्ब्लीमध्ये बॉम्ब टाकून इन्कलाब जिंदाबाद’चा नारा दिला. सुखदेव आणि राजगुरू हेही त्यांच्या सोबत होते. ब्रिटिश सरकारने या तिघांना २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी दिली. तो दिवस आज आपण शहीद दिवस म्हणून पाळतो. प्रास्ताविक प्राध्यापिका मधुबाला लोणारी यांनी केले. आभार प्रा. सौरभ भस्मे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा राजशेखर पवार डॉ. शितल झिंगाडे- भस्मे, मनीषा शिंदे, सोनाली कटकधोंड, भीम सोनकांबळे, शिल्पा धूमशेट्टी, ओंकार घिवारे उपस्थित होते. हुतात्म्यांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांनी देशप्रेम, धैर्य आणि निस्वार्थ सेवा यांचा आदर्श घालून दिला, त्यांची शौर्यगाथा सदैव आपल्या हृदयात जिवंत ठेवण्यासाठी युवकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेतला पाहिजे असे मत मलकप्पा भरमशेट्टी यांनी व्यक्त केले.
पाणवठ्यावर या पक्ष्यांचा भरतो मेळा स्थानिक पक्षी : चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क), मुग्धबलाक (ओपन बिल स्टॉर्क), चमचेचोच (स्पून बि), काळा व पांढरे कुदळे ( आयबिस), पाणकावळे (कार्मोरंट), शेकाट्या (स्टिल्ट), राखी बगळा (ग्रे हेरॉन), वंचक (पॉंड हेरॉन), मध्यम व पात बगळे (मेडियन ॲड लिट्ल इग्रेट), लाल गाल्या टिटवी (रेड वॅटल्ड लॅपविंग), वारकरी (कूट), हळदीकुंकू बदक (स्पॉट बिल्ड डक), अबलक व छोटा खंड्या (पाईड व लिट्ल किंगफिशर), बंड्या (व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर), वेडा राघू (ग्रीन बी ईटर), पाकोळ्या (स्विफ्ट), कोतवाल ,होले व पारवे स्थलांतरित पक्षी : नीळकंठ (ब्ल्यू जे), चातक (ब्रेस्टेड कुकू), धोबी (वॅगन टेल), नदी सुरय (रिव्हर टर्न), जांभळा बगळा (पर्पल हेरॉन), पात्राला (स्नाईप) शिकारी पक्षी : ससाणा, भोवत्या, पाणघारी, मधूबाज, काळी चार, ब्राह्मणी चार, खाटिक. नवीन जलस्थळ पक्ष्यांच्या अधिवासासाठी उपयुक्त नव्याने निर्माण झालेल्या या पाणवठ्यावर प्रचंड प्रमाणात पाणकणिस वाढल्यामुळे विविध पक्ष्यांसाठी सुरक्षित अधिवास उपलब्ध झाले आहे. सुपीक मातीत साठलेल्या पाण्यात अनेक पक्ष्यांचे प्रमुख खाद्य असलेले शेवाळांबरोबर जलकीटक व चिखलातील कृमीकीटकांची जोमाने वाढ होते. त्यामुळे याठिकाणी विविध पक्षी आपल्या उदरनिर्वाहासाठी येत आहेत. -डॉ. अरविंद कुंभार. ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक. जलस्थानाचे (वेटलॅंड) वैशिष्टये : हत्तूरगावाजवळ पुणे -विजयपूर बाह्य वळण महामार्ग व सेवारस्त्याच्या निर्मितीच्या वेळी पावसाचे पाणी साठून एक भलं मोठं पाणवठा तयार झाला आहे. गेल्या दोन-तीन वर्षात याठिकाणी दलदल तयार होऊन पाणवठ्यात पाणकणिस ही जलवनस्पती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे पक्ष्यांना चरण्यासाठी व अधिवासासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या बहुविध प्रजातींच्या हजेरी सातत्याने वाढत आहे. सोलापूर- विजयपूर ते पुणे या महामार्गावर हत्तूर गावाजवळ नव्याने झालेल्या महामार्ग विस्तारीकरणामुळे ४ ते ५ एकर जमीनीवर नव्या पाणवठ्याची निर्मिती झालेली आहे. ही पक्षांच्या अधिवासासाठी पोषक आहे उमेश कदम | सोलापूर सोलापूर शहरापासून जवळच असलेल्या सोलापूर- विजयपूर- पुणे महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यालगत नव्याने साकारलेल्या जलस्थान पक्षीजीवांसाठी सुरक्षित अधिवासाचे केंद्र बनले आहे. दोन महामार्ग जोडताना नव्याने ४ ते ५ एकरात निर्माण झालेल्या या वेटलँडवर ५० हून अधिक प्रकारचा मुक्त वावर दिसून येत आहे. सुपीक मातीत साठलेल्या पाण्यात मिळणारे खाद्य, शेवाळांसह जलकीटक, कृमीकीटकांमुळे पक्ष्यांसाठी उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. रशिया व मंगोलिय येथून ५ हजार किमीचा प्रवास करत चक्रवाक बदके याठिकाणी दाखल झाले आहे . पक्षीप्रेमींनाही भुरळ पडत आहे.
पंढरपूर शहरातील सर्वात महत्वाच्या मार्गावरील उड्डाण पुलाचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सरगम चौक आणि भोसले चौक या दोन ठिकाणी स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध केल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून या पुलाचे काम ठप्प आहे. तर दुसरीकडे शहर भाजप आणि पालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी या पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे यासाठी आग्रही मागणी केली आहे. काम तत्काळ पूर्ण करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. पालखी मार्गावर सध्या मार्केट यार्ड ते सरगम टॉकीज आणि इंदिरा गांधी चौक ते भिंगे चौक दरम्यान उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, नवीपेठ परिसरातील काही नागरिकांनी नगरपरिषदेच्या जागेवरील स्वतःचे अतिक्रमण वाचवण्यासाठी स्थानिक लोकांना हाताशी धरून या कामाला विरोध सुरू केला आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून काम बंद ठेवले आहे. दरम्यान, चैत्री यात्रेच्या तोंडावर वाहतूक कोंडी वाढली असून या पुलाचे काम तात्काळ पूर्ण करावे, या मागणीसाठी भाजपचे उपनगराध्यक्ष, गटनेते आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांना निवेदन देण्यात आले.उड्डाणपुलामुळे कोणत्याही व्यापाऱ्याचे नुकसान होणार नाही किंवा जागा बाधित होणार नाही. तरीही काही राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते केवळ विरोधासाठी विरोध करत आहेत . विकासात अडथळा आणणाऱ्या प्रवृत्तींवर कायदेशीर कारवाई न झाल्यास भाविक आणि नागरिकांसह धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, गटनेते भागवत बडवे, सुजितकुमार सर्वगोड, भाजप शहराध्यक्ष रोहित पानकर, पाणीपुरवठा सभापती अमोल डोके, नगरसेवक ॲड. सुनील वाळूजकर सिकंदर ढवळे आदी उपस्थित होते. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांचा व्यापाऱ्यांना पाठिंबा दिल्याने राजकीय रंग कर्नल भोसले चौक येथील व्यापाऱ्यांनी काम बंद पडल्यानंतर केलेल्या आंदोलनास तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. जेष्ठ नगरसेवक नागेश भोसले, माजी नगरसेवक किरण घाडगे आदींनी आंदोलनात सहभागी होऊन व्यापाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या उड्डाण पुलाच्या उभारणीस राजकीय रंग आलेला दिसून येत आहे.
बार्शी गुढी पाडव्या निमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षी ही येथील मल्लिकार्जुन मंदिरातील मनाच्या नंदीध्वज काठीची पारंपरिक वाद्यांच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. मागील सुमारे दीडशे वर्षांपासून कसले परिवाराच्या वतीने ही परंपरा जोपासण्यात येत आहे. कथले परिवाराचेवतीने पाडव्या निमित्त काढण्यात येणारी नंदीध्वज काठी मिरवणूक ही शहराच्या सांस्कृतिक वारसा जपणारी ठरली आहे. याला पौराणिक अधिष्ठान असून चैत्र शुद्ध अष्टमी ते चैत्र वद्य प्रथम या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या शिवपार्वती सोहळ्याचा शुभारंभ या नंदीध्वज काठीच्या स्थापनेने करण्यात येतो. तर सोहळ्याची मुहूर्तमेढ गुढीपाडव्याच्या दिवशी निघणाऱ्या मिरवणुकीतून रोवली जाते. या मिरवणुकीचा शुभारंभ माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मल्लिकार्जुन मंदिर प्रमुख बाबासाहेब कथले, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले,प्रशांत कथले, आसिफ तांबोळी, पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे, दीपक रोंगे, विलास रेणके, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लोढा, महेश बाफना उपस्थित होते.मिरवणुकीपूर्वी मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वज काठीचे विधिवत पूजन कथले परिवाराच्या हस्ते पार पडले. त्यानंतर मिरवणूक कापड बाजार पेठ, सावरकर चौक, भगवंत मंदिर परिसर आणि कसबा पेठ या प्रमुख मार्गांवरून उत्साहात मार्गक्रमण करत पुन्हा मंदिरात आली. कार्यक्रम यशस्वितेसाठी आप्पा कथले, दादासाहेब कथले, प्रशांत कथले, महेंद्र कथले, मनोज कथले यांच्यासह कथले कुटुंबातील सदस्य परिश्रम घेत आहेत. धार्मिक व सांस्कृतिक जीवनात योगदान कथले कुटुंबाच्या वतीने ही परंपरा सुमारे १५० वर्षांपासून अत्यंत श्रद्धा व भक्तिभावाने जपली जात असून शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. बाबासाहेब कथले, देवस्थान प्रमुख
यंदाच्या मान्सूनमध्ये झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे हिंगणी व जवळगाव परिसरातील पाणी प्रकल्पांना भरपूर पाणीसाठा लाभला आहे. मार्च महिन्यापर्यंत हिंगणी प्रकल्पांमध्ये सध्या ५९ टक्के उपयुक्त पाणीसाठा तर जवळगाव प्रकल्पात ५६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे, दोन्हीही प्रकल्पामध्ये पाणीसाठा समाधानकारक स्थितीत आहे. उन्हामुळे पाण्याचा वापर अन् बाष्पीभवन वाढले तरी प्रकल्पातील पाणी जुलैपर्यंत पुरणार आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यापासून शेती पिकांना पाणी देण्यासाठी प्रकल्पातून पाण्याचा उपसा वाढतो. ज्या वर्षी कमी पाऊसकाळ असायचा, त्या वर्षी डिसेंबरपासून प्रकल्पातही पाण्याची पातळी खालावू लागते. मार्च महिन्यात टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागताच प्रशासनाला अधिग्रहण व टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागायचा. कमी पाण्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसायचा. परिणामी, उत्पादनात घट येण्याची शक्यता अधिक असायची. मात्र, यंदा चांगला पाऊस झाल्याने पाणी मुबलक आहे. हिंगणी प्रकल्पाची साठवण क्षमता १६०० दशलक्ष इतकी आहे. मार्च अखेरीस प्रकल्पात १८ .९३ दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ५९ टक्के एवढी आहे. तर जवळगाव प्रकल्पामध्ये साठवण क्षमता १२३३ असून सध्या १६६३ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ५६ % एवढी आहे. या हिंगणी प्रकल्पाच्या पाणी साठ्यामध्ये उन्हाळा हंगामात गेल्या जलशयावरून ९५० हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. उन्हाळा हंगामाचे कालव्याचे आवर्तनयातून १९० हेक्टर इतके क्षेत्र ओळीताखाली येऊ शकते. या प्रकल्पावर वैराग, उपळे, गौडगावासह आठ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. पुरेस पाणी असल्याने यंदा टंचाई नाही. ^मान्सूनमध्ये चांगले पाऊस झाले होते. उन्हामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. बाष्पीभवनही तीन महिन्यात २० टक्के होईल. उपलब्ध पाणी जुलै महिन्यापर्यंत पुरेल असे नियोजन केले आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. ज्यामुळे टंचाई जाणवणार नाही. अभिषेक देसाई, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग बार्शी
जीवनातील सर्व यशाचा पाया सकारात्मक विचारांमध्ये आहे. त्यामुळे नकारात्मकतेपासून दूर राहून सकारात्मकतेकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन लेखक व प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस मुख्यालयात आनंदी जीवन आयुष्याचा आनंद उत्सव या व्यक्तिमत्व विकास विषयावरील विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात दत्तात्रय वारकड यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस निरीक्षक उमेश परदेशी, राखीव पोलीस उपनिरीक्षक विजय भोसले तसेच विविध पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सध्याच्या धावपळीच्या व स्पर्धात्मक युगामध्ये मानव आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सतत धडपड करत आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती, डिजिटल युग, एआय आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव यामुळे जीवन अत्यंत वेगवान झाले आहे. मात्र या वेगवान जीवनशैलीत मनःशांती, समाधान आणि आनंद लोप पावत चालल्याचे वास्तव आहे. अशा परिस्थितीत मानसिक सुख, शांती आणि आनंदी जीवन कसे जगावे, याविषयी वारकड यांनी मार्गदर्शन केले. समाजात कायदा व सुव्यवस्था राखताना पोलीस अधिकारी व कर्मचारी तन, मन आणि धन अर्पण करून कार्यरत असतात. या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना ताणतणाव, मानसिक दडपण आणि कुटुंबासाठी वेळ न मिळण्यासारख्या अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी संयम, सकारात्मकता आणि शांत मन ठेवणे किती आवश्यक आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला. रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यानंतर १५ ते २० मिनिटे सकारात्मक वाचन केल्यास जीवनाकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक बनते. आपण आज जे काही आहोत ते आपल्या विचारांमुळेच आहोत असे स्पष्ट करत त्यांनी विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. विचार जीवनावर आणि कल्पना जगावर राज्य करतात असे सांगत त्यांनी विमान, दूरध्वनी, मोटार वाहन यांसारख्या शोधांचे मूळ विचारांमध्येच दडलेले असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी राखीव पोलीस उपनिरीक्षक विजय भोसले यांनी दत्तात्रय वारकड यांचा सन्मान करून उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगड येथे उभारण्यात येत असलेल्या ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या मंदिराच्या बांधकामाला भाविकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरातून देणग्यांचा ओघ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नांदूर निंबादैत्य येथील दहिफळे कुटुंबीयांनी तब्बल २२ लाख २२ हजार २२२ रुपयांची रोख स्वरूपात देणगी देऊन मंदिराच्या कामाला हातभार लावला आहे. भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी मंदीर बांधकामासाठी भाविकांना केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत शहादेव पंढरीनाथ दहिफळे यांनी ११ लाख ११ हजार १११ रुपये, तर त्यांचे चुलत बंधू नारायण दहिफळे यांनीही तितकीच रक्कम देणगी स्वरूपात अर्पण केली. या दोन्ही देणग्यांचा मिळून एकूण २२ लाख २२ हजार २२२ रुपयांचा निधी मंदिर उभारणीसाठी प्रदान करण्यात आला. नुकतेच महंत नामदेव महाराज शास्त्री नांदूर निंबादैत्य येथे भेटीवर आले असता दहिफळे कुटुंबीयांनी ही देणगी त्यांच्या हस्ते रोख स्वरूपात सुपूर्द केली. यावेळी गावातील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवानगड हे राज्यातील एक महत्त्वाचे धार्मिक व आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते. येथे उभारण्यात येणारे ज्ञानेश्वर माऊली महाराजांचे मंदिर भविष्यात भाविकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. मंदिराचे काम सध्या प्रगतीपथावर असून भाविकांच्या सहकार्यामुळे या कामाला वेग मिळत आहे. दहिफळे कुटुंबीयांनी केलेल्या या देणगीमुळे धार्मिक कार्याला मोठी चालना मिळाली असून त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अशा प्रकारच्या देणग्यांमुळे मंदिर उभारणीचे स्वप्न लवकरच साकार होण्यास मदत होणार असल्याचे मत महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले. यावेळी भाविक उपस्थित होते.
तालुक्यातील गवळीवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थी मेळावा, शालेय पूर्वतयारी मेळावा आणि ‘आनंदी बाजार’ या उपक्रमांचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या निमित्त शाळेचा परिसर माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींनी आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहाने भारावून गेला होता. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता प्रतिमापूजन व स्वागत गीताने झाली. माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. ‘आठवणींचा कट्टा’ या विशेष सत्रात अनेकांनी भावनिक होत मनोगत व्यक्त करत शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेला ‘बाल आनंद बाजार’ उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला. विद्यार्थ्यांनी उभारलेल्या विविध स्टॉल्समुळे परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी डॉ. महेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी १ हजार रुपयांची देणगी देत सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या या योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये अनिलराव मडके, राजेंद्र खंडागळे, वाय. डी. कोल्हे, प्रकाश खंडागळे, महेश भालेराव, आप्पा गिरम आणि प्रदीप गवळी यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन मुक्ता कृष्णा बारगजे, मदन जाधव आणि सहकारी शिक्षकांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरला. मराठी शाळा, उद्याचा उज्ज्वल काळ आणि संस्कृतीची जपणूक, आपली मराठी शाळा या घोषवाक्यांचा प्रत्यय या कार्यक्रमातून आला. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समित व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
पारनेर शहरातून जाणाऱ्या गणपती फाटा ते हिंद चौक (पानोली फाटा) दरम्यान झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसे रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शहरातील खालच्या वेशीजवळ तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले.रस्त्याची झालेली चाळण,त्यामुळे वारंवार होणारी वाहतूक कोंडी,छोटे-मोठे अपघात तसेच उखडलेल्या रस्त्यामुळे शहरात गेल्या वर्षभरापासून असलेले धुळीचे साम्राज्य यामुळे त्रस्त झालेले पारनेरचे नागरिक आंदोलनादरम्यान आक्रमक झाले होते. १ एप्रिल पासून रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी होणारे सर्वेक्षण सुरू करण्यात येईल, असे आश्वासन संबंधित कामाच्या ठेकेदार कंपनीतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुबोध वसईकर यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.आंदोलनादरम्यान वाहतूक ठप्प झाली होती.आंदोलन संपल्यानंतरही सुमारे एक तास विस्कळित झाली होती. आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जून भालेकर, बाजार समितीचे संचालक रा.या.औटी,राष्ट्रवाद ीच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.बाळासाहेब कावरे,पाणी पुरवठा समितीचे सभापती योगेश मते,माजी नगराध्यक्ष विजय औटी, नितीन आडसुळ, बाळासाहेब मते, नगरसेवक अशोक चेडे, भूषण शेलार,दत्ता आंबुले,शिरीष शेटीया,चंदन भळगट,उद्योजक राजू औटी,पांडुरंग खोडदे,शंकर नगरे, विठ्ठल औटी,विजय डोळ,चंद्रकांत कावरे,सखाराम औटी,पत्रकार विनोद गोळे,भगवान गायकवाड, ॲड गणेश कावरे आदी सहभागी झाले होते. गेल्या वर्षभरापासून हिंद चौक ते क्रीडा संकुल आणि गणपती फाटा या प्रमुख मार्गांची अवस्था खराब झाली आहे. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालक व पादचारी त्रस्त झाले आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही दखल न घेतल्याने नागरिकांनी अखेर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आंदोलकांनी रस्ता अडवत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनात मोठ्या संख्येने महिला व युवकही सहभागी झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुबोध वसईकर व राजपथ इन्फ्रा कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र चव्हाण यांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत,लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय रस्ता मोकळा करणार नाही,अशी भूमिका घेतली. शहरातील खड्डे तातडीने डांबर टाकून बुजवण्यात येतील, नवीन रस्त्यांसाठी आवश्यक सर्वेक्षण १ तारखेपासून सुरू होईल, पुढील १५ दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करून कामाला गती दिली जाईल असे आश्वासन उपविभागीय अभियंता वसईकर यांनी ठेकेदार कंपनीच्या वतीने दिले. प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन १ एप्रिल पासून प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही,तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.दरम्यान आंदोलन शहरातील रस्त्यांबाबत असताना राजपथ कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक चव्हाण मात्र इतर गावांचा मुद्दा उपस्थित करत असल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. आंदोलन शहरासाठी आहे, त्यावरच बोला,असे खडसावत नागरिकांनी प्रकल्प व्यवस्थापकांना धारेवर धरले.
एकीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती व व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवत आहे. हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजक अनेक क्षेत्रात गॅस नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र, या संकटकाळात अहिल्यानगरमधील एका तरुणाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत घरातील ओल्या कचऱ्यापासून स्वयंपाकासाठी उपयुक्त असा गॅस तयार केला आहे. या उपक्रमामुळे एकाच वेळी गॅस टंचाई आणि कचरा व्यवस्थापन अशा दोन्ही समस्यांवर मात होईल. कचरामुक्त व ऊर्जासंपन्न अहिल्यानगरसाठी हा पथदर्शी उपक्रम असल्याचे मत आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केले. सावेडी परिसरातील प्रशांत दरेकर या तरुणाने घरातील ओल्या कचऱ्यापासून स्वयंपाकासाठी उपयुक्त असा गॅस तयार करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी या उपक्रमाला भेट देऊन पाहणी केली. दरेकर यांनी उभारलेल्या या घरगुती बायोगॅस प्रकल्पामध्ये दररोज जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने निचरा केला जातो आणि त्या प्रक्रियेतून थेट स्वयंपाकाचा गॅस मिळवला जातो. ओला कचरा, योग्य पद्धतीने हाताळल्यास किती फायदेशीर ठरू शकतो, हे प्रशांत यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
विज्ञान, श्रध्दा, अंधश्रद्धा, कर्मकांड, धार्मिक आणि अध्यात्मिक हे वेगवेगळे विषय आहेत. मी आणि अध्यात्म यामधील इगो हा मोठा अडथळा आहे. आपले देव आणि गुरू यांच्याबद्दल भीती नव्हे तर आदर, आपलेपणा, प्रेम वाटले पाहिजे. देवांशी आणि गुरूंशी आपल्याला मनमोकळेपणाने बोलता आले पाहिजे. मार्गदर्शन घेता आले पाहिजे, असे मत सतीश फडके यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदॠषिजी महाराजांच्या ३४ व्या पुण्यस्मृतीदिनानिमित ्त आनंदधाममध्ये आयोजित भगवान महावीर व्याख्यानमालेचे व्दितीय पुष्प गुंफताना तुमचे आमचे अध्यात्म या विषयावर ते बोलत होते. स्वागत सपना कटारिया यांनी केले. प्रा.प्रसाद बेडेकर यांनी वक्त्याचा परिचय करून दिला. इमरतबाई मुनोत आणि राहुल मुनोत (नेवासावाला) यांच्या हस्ते वक्त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सिमा मुनोत, सुरेश कटारिया आदी उपस्थित होते. फडके म्हणाले, विज्ञान, श्रध्दा, अंधश्रद्धा, कर्मकांड, धार्मिकता या पलिकडे अध्यात्मिक व्यक्ती असते. धार्मिकतेच्या आणि श्रध्देच्या नावाखाली कर्मकांड करणारे अध्यात्मिक नव्हेत. काही गुरू- सद् गुरू आपल्या शिष्यांना कर्मकांडातच रमवतात. सत्संग शुध्द ज्ञानापर्यंत नेणारा पाहिजे. आपल्या पूर्वापार चालत आलेल्या रूढी, परंपरा आणि कर्मकांड यामध्ये गैरसमजच खूप आहेत. आजच्या खोट्यांच्या बाजारात सर्वसामान्यांना नेमके खरे काय? तेच कळत नाही. मला सगळे कळते ही महाचूक असते. जे चुकते ते मान्य करणे ही अध्यात्माची पहिली पायरी. आपण कोण? याचे उत्तर शांतपणे पाहिले पाहिजे. ईश्वर प्राप्ती हा मुख्य उद्देश समोर ठेवून प्रपंच नेटका केला की, मग परमार्थ साधावा. संन्यास घेऊन लवकर ईश्वर प्राप्ती करता येईलच, असे नाही! प्रापंचिक माणूस लवकर अध्यात्मिक होऊन ईश्वर प्राप्ती पर्यंत पोहोचतो. संसारात जो राहू शकला तो अध्यात्मिक होण्याची फुल गॅरंटी असते. ईश्वर प्राप्तीसाठी संन्यास घेण्याची गरज नाही. आपल्या तक्रारी घेऊन सद् गुरूंकडे जावू नका. आपल्या संसाराची ओझी सद् गुरूंवर टाकू नका. सद् गुरूंचा उपयोग प्रापंचिक समस्यांची सोडवणूक करून घेण्यासाठी न करता अध्यात्मिक उन्नतीसाठी करा, असे आवाहन फडके यांनी केले. आभार संतोष गांधी यांनी मानले.
शहराजवळील मुंबई–आग्रा महामार्गावरील सीएनजी पंपावर सध्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पंपापासून महामार्गापर्यंत वाहनांची रांग पोहोचत असल्याने वाहतुकीवर परिणाम होत असून वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यातच विल्होळी येथील सीएनजी पंपावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने इगतपुरीवरील ताण आणखी वाढला आहे. परिणामी नाशिक, सिन्नर, त्र्यंबक, कसारा आदी भागांतून मोठ्या संख्येने वाहनचालक आणि रिक्षाचालक इगतपुरीत सीएनजी भरण्यासाठी येत आहेत. इगतपुरीतील सीएनजी तुटवड्यामुळे विशेषतः रिक्षाचालक आणि छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. रोजंदारीवर चालणाऱ्या वाहनचालकांना तासन्तास रांगेत थांबावे लागत असल्याने त्यांच्या फेऱ्या कमी होत आहेत. काही जण महागडे इंधन वापरत आहेत, तर काहींनी तात्पुरते वाहन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात भरीव योगदान देण्याचे भाग्य बोटावर मोजता येणाऱ्या कुटुंबांनाच लाभते. असे भाग्य असणारे डॉ. जे. डी. पवार यांच्या कुटुंबाने बांधलेल्या नागरी शैलीतील गुरुदेव दत्त मंदिर परिसरातील भाविक भक्तांना प्रेरणा देत राहील, असा उपदेश गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केला. तालुक्यातील मानूर येथे गुरुदत्त शिक्षण संस्थेच्या आवारात डॉ. जे. डी. पवार यांनी स्वखर्चाने बांधलेल्या गुरुदेव दत्त मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमप्रसंगी अण्णासाहेब मोरे यांनी उपस्थित राहून भाविकांना उपदेश केला. व्यासपीठावर मीनाक्षी पवार, शैलेश पवार, चैताली पवार, प्राचार्य बी. एन. शिंदे उपस्थित होते. पुढे बोलताना गुरुमाऊली मोरे म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृतीत आध्यात्मिक क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र, या अध्यात्माला ज्ञानाची जोड देण्यासाठी शैक्षणिक संस्थेच्या आवारात अर्धा एकर जागेत, गुरुदेव दत्ताचे प्राचीन शैलीतील भव्य दिव्य आकर्षक मंदिर उभारून विद्यार्थ्यांसाठी आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासोबतच आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचे काम सुरू केले आहे. मंदिरातील परिसर अतिशय शांत आणि अध्यात्मासाठी, ध्यान धारणा करण्यासाठी खूप छान झाला असून, इथे आल्याने मनशांती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. जे. डी. पवार यांनी त्यांना गुरुदेव दत्ताची मूर्ती देवून सन्मानित केले. प्राचार्य बी. एन. शिंदे यांनी प्रास्तविक केले. शैलेश पवार यांनी आभार मानले. यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरसूल पोलिस ठाण्याच्या पुढाकारातून आयोजित रोजगार मेळाव्यात ४२९ युवक-युवतींनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी १९५ जणांना जागेवरच नोकरीची ऑफर देण्यात आली. ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही मोठी संधी ठरली आहे. नाशिक ग्रामीण पोलिस हरसूल आणि शासनमान्य प्लेसमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस ठाण्याच्या आवारात हा मेळावा पार पडला. आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई आणि जळगाव येथील सुमारे ३३ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेत एकूण १५०० रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या. मेळाव्यात उपस्थित ४२९ उमेदवारांपैकी ३१० जणांची प्राथमिक निवड करण्यात आली. त्यापैकी १९५ उमेदवारांना ऑन-द-स्पॉट ऑफर लेटर देण्यात आले. निवड झालेल्या उमेदवारांना २५ हजार रुपयांपर्यंत वेतनाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या उपक्रमासाठी सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, गृह रक्षक दलाचे जवान, पोलिस पाटील तसेच स्थानिक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. हरसूल परिसरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावा पार पडल्याने समाधान व्यक्त होत आहे.
परधाडीमध्ये कुरडया बनविण्याची लगबग सुरू:कडकउन असल्याने महिला बनवतायेत विविध टिकाऊ खाद्यपदार्थ
उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामीण भागात पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. नांदगाव तालुक्यातील परधाडी गावात सध्या महिलांकडून कुरडया बनविण्याचे काम मोठ्या उत्साहात सुरू आहे. उन्हाळ्यातील कडक उन्हाचा फायदा घेऊन वर्षभर टिकणाऱ्या कुरडया तयार करण्याची परंपरा आजही जपली जात आहे. गावातील गल्लीबोळांत महिला सकाळी लवकर एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने कुरडया बनवताना दिसत आहेत. या प्रक्रियेमुळे महिलांमध्ये एकोपा वाढतो तसेच कामही जलद गतीने पूर्ण होते. कुरडया तयार करण्यासाठी साधारणपणे एका पायलीचे (सुमारे ७ किलो) गहू घेतले जातात. या प्रमाणातून तब्बल १५० कुरडया तयार होतात, अशी माहिती स्थानिक महिलांनी दिली. कुरडया तयार करण्याची प्रक्रिया मेहनतीची आहे. प्रथम गहू तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवले जातात. चौथ्या दिवशी त्याचे पीठ तयार करून लाकडाच्या चुलीवर शिजवले जाते. त्यानंतर तयार मिश्रणापासून कुरडया बनवून त्या उन्हात वाळविल्या जातात. कडक उन्हामुळे त्या लवकर वाळून टिकाऊ बनतात. विशेष म्हणजे, शेतातील गव्हाची कापणी झाल्यानंतर घरच्या गव्हापासूनच कुरडया तयार केल्या जातात. त्यामुळे त्या अधिक चविष्ट आणि पौष्टिक मानल्या जातात. वर्षभर या कुरडया तळून स्वयंपाकघरात वापरल्या जातात. उन्हाळा म्हणजे केवळ उष्णतेचा त्रास नव्हे, तर पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्याचा काळ असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित होते. ग्रामीण भागातील या उपक्रमामुळे परंपरा जिवंत राहते. कुरडयांची परंपरा आजही अखंडित कायम आहे. प्रत्येक कुरडई बनवण्यासाठी लागणारे कष्ट आणि काळजी उल्लेखनीय असून, घरच्या स्वयंपाकघरात भाजी बनवताना किंवा तळताना त्या केवळ चविष्टच नाहीत तर पोषकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. - संगिता गायकवाड, गृहिणी
वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे ज्ञानेश्वर वसंत पवार यांच्या घराची पाठीमागील भिंत फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी (२३ मार्च) पहाटे उघडकीस आली. खंडाळा येथील गट नंबर ५१६ मध्ये पवार कुटुंब राहते. ज्ञानेश्वर पवार कुटुंबासह रोजच्याप्रमाणे समोरच्या खोलीत झोपले होते. पहाटे ज्ञानेश्वर पवार लाइट लावण्यासाठी मागच्या खोलीत गेले. तेव्हा घरातील वस्तू, साहित्य अस्ताव्यस्त दिसले. चोरी झाल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वी ज्ञानेश्वर पवार यांच्या लहान मुलाचा विवाह झाला होता. कपाटातील नवविवाहितेचे बहुतांश सोन्याचे दागिने, चांदीचा ऐवज चोरट्यांनी नेला. रोख रकमेसह जवळपास दीड लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे पवार कुटुंबाने सांगितले. चोरीनंतर लग्नात आलेले नवीन साहित्य, इतर वस्तू घराच्या बाजूच्या शेतात फेकून दिल्याचे आढळले. घरमालकाचा मुलगा रवी पवार म्हणाला, पहाटे वडील मागच्या खोलीतील लाइट लावायला उठले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त दिसले. त्यांनी मला आवाज दिला. मी मागच्या खोलीत गेलो. पाठीमागची भिंत फोडलेली दिसली. भावाचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. वहिनीचे दोन चेन, आठ जोडवे, दोन सोन्याच्या नथी, पाच ग्रॅमची अंगठी, मिक्सर, इलेक्ट्रिक शेगडी अशा अनेक वस्तू चोरीला गेल्या.
पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या; आ. भुमरेंची मंत्री भरणेंकडे मागणी
तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीसह गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार विलास भुमरे यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन केली आहे. अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांना मोठा फटका बसला. गहू, हरभरा, कांदा, फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गारपिटीमुळे अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे आडवी पडली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आमदार भुमरे यांनी कृषिमंत्री भरणे यांची भेट घेऊन पैठण तालुक्यातील बाधित भागांची तातडीने पाहणी करण्याची मागणी केली. कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतात जाऊन पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, असेही त्यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी. शासनाने विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली. पैठण तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले, असे भुमरे यांनी सांगितले.
श्री भद्रा मारुती संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य आणि दिमाखदार कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा केवळ क्रीडा स्पर्धा नसून परिसरातील सांस्कृतिक आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक मानली जाते. गावातील ज्येष्ठ नागरिक, कुस्तीप्रेमी आणि तरुणाई यांचा उत्स्फूर्त सहभाग या दंगलीत दिसून आला. या स्पर्धेतील सर्वाधिक उत्कंठावर्धक आणि लक्षवेधी ठरलेली शेवटची कुस्ती हरियाणा राज्यातून आलेल्या पवन दहियाने या ताकदवान कुस्तीगीराने जिंकत आपला दबदबा सिद्ध केला. प्रतिस्पर्ध्यावर प्रभावी डावपेच, चपळ हालचाली आणि ताकदीच्या जोरावर त्याने निर्णायक विजय मिळवला. संपूर्ण मैदानात त्याच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत करत कौतुक केले. या विजयामुळे पवनने केवळ मानाची गदा पटकावली नाही तर उपस्थित कुस्तीप्रेमींच्या मनातही आपली छाप निर्माण केली. विजेत्या पवनला भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू बारगळ यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा आणि ११ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यावेळी विजेत्याचा सत्कार करताना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्याचा गौरव केला. या वेळी संस्थेचे विश्वस्त मंडळ, पदाधिकारी तसेच गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारितोषिक वितरण सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विजेत्यांसोबत उपविजेत्यांचाही सन्मान करण्यात आला, ज्यामुळे खेळाडूंमध्ये प्रोत्साहनाची भावना अधिक दृढ झाली. पराभूत पहिलवानालाही दिली २० टक्के रक्कम स्पर्धेत विजेत्या पहिलवानाला ठरलेल्या बक्षीस रकमेपैकी ८० टक्के, तर पराभूत पहिलवानाला २० टक्के रक्कम देण्याची पारदर्शक आणि प्रोत्साहनपर पद्धत अवलंबण्यात आली होती. या पद्धतीमुळे पराभूत खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळत असून स्पर्धात्मक वातावरण सकारात्मक राहते. या वेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, उपाध्यक्ष बाबासाहेब बारगळ, सदस्य कचरू बारगळ, खंडेराव बारगळ, नगरसेवक कैलास बारगळ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. मुलांपासून सुरुवात, दिवसभर चालली स्पर्धा या कुस्ती स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह हरियाणा राज्यातील सुमारे २०० ते २५० अनुभवी आणि नवोदित पहिलवानांनी सहभाग घेतला होता. लहान मुलांच्या कुस्तीपासून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली, ज्यामुळे बालवयातच कुस्तीची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून आला. विविध वजन गटांमध्ये आणि वयोगटांमध्ये कुस्त्या रंगल्या. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र बक्षिसांची तरतूद करण्यात आली होती. ५०० रुपयांपासून ते ११ हजार रुपयांपर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली होती.
सिल्लोड-सोयगाव मतदारसंघामध्ये विषय पुनरीक्षण प्रक्रियेमध्ये होत असलेला विलंब, अनियमितता व राजकीय हस्तक्षेप याबाबत सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार सिल्लोड यांना भाजपतर्फे निवेदन देण्यात आले असून निवेदनात म्हटले आहे की, सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील याद्यांच्या प्राथमिक पडताळणीमध्ये गंभीर स्वरूपाच्या अनियमितता निदर्शनास आल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार जालना, बुलढाणा, जळगाव, नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदारांची नावे त्यांच्या मूळ मतदारसंघात असतानाही ही नावे सिल्लोड मतदारसंघामध्ये सामाविष्ट करण्यात आली आहेत. एकाच व्यक्तीची नावे एकापेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये नोंद झालेली असून ही बाब जनतेचे प्रतिनिधित्व अधिनियम, १९५०मधील तरतुदीनुसार प्रतिकूल आहे. तसेच सिल्लोड शहरामध्ये अंदाजे ३ हजार ५०० व संपूर्ण तालुक्यात सुमारे १२ हजार इतके मृत मतदार असताना अशा मतदारांची नावे याद्यांमध्ये कायम असल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. याशिवाय विवाह झालेल्या महिलांची नावे माहेर व सासर अशा दोन्ही ठिकाणी नोंदवलेली असल्याचे मोठ्या प्रमाणात आढळून येते. तसेच परदेशी नागरिक, बांगलादेशी, रोहिंग्या यांची नावे समाविष्ट असल्याची बाब अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार ही बाब लोकशाही व्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांना बाधा आणणारी आहे. आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेमध्ये संबंधित बीएलओमार्फत जाणीवपूर्वक हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येते. तसेच स्थानिक आमदार अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या प्रभावाखाली हस्तक्षेप होत असल्याबाबतचा गंभीर आरोप या निवेदनात नमूद करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक तसेच नगर परिषद येथील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष पडताळणीमध्ये हस्तक्षेप करीत आहेत. काही प्रकरणांमध्ये बीएलओची मोबाइल व इतर उपकरणे इतरांमार्फत वापरली जात असल्याचेही समजते. परिणामी सिल्लोड शहरामध्ये केवळ सुमारे १५ टक्के तर ग्रामीण भागात ५० टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. या कामात जाणीवपूर्वक विलंब व निष्क्रियता दिसून येत आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे दुबार व बोगस मतदारांची नावे वगळण्यात येऊ नयेत, असा प्रयत्न होत असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर भाजप सिल्लोड मंडळ अध्यक्ष मनोज मोरेल्लू, किसान मोर्चाचे मकरंद कोर्डे, नगरसेवक कमलेश कटारिया यांच्यासह गणेश भूमकर, स्वप्निल शिनगारे, शामराव आळणे, मोतीराम मिसाळ, अमोल कुलकर्णी, वसीम बागवान आदी हजर होते. भाजपने दिलेले निवेदन बोगस : आमदार सत्तार या तक्रारीसंदर्भात स्थानिक आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मतदार यादी विशेष पुनरीक्षण हे संपूर्ण भारतात सुरू आहे. यात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. भाजपने दिलेले निवेदन हे बोगस असून ज्या मतदारांची नावे मतदार यादीत दुबार असतील त्यांची नावे आपोआप कमी होणार आहेत.
भोंदू कॅप्टन अशोक खरातविरोधात तक्रारदार महिलांची संख्या वाढत असून रविवारी रात्री २ महिलांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रॉपर्टी कार्यालयात या दोन्ही महिलांना गृह शांती, आणि भविष्याबाबत माहिती देण्याकरता बोलावून घेत गुंगीचे औषध पिण्यास देत संमोहित करून कार्यालयातच बलात्कार केल्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे. अटक झाल्यानंतर खरातला सुनावण्यात आलेल्या पोलिस कोठडीची मुदत आज (दि. २४) संपणार असून त्याला आज नाशिकच्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. खरात लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडिता तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. रविवारी खरातविरोधात दोन गुन्हे दाखल झाले. ३० ते ३५ वयोगटातील या तक्रारदार दोन महिला उच्चशिक्षित आहेत. एक वैद्यकीय, तर दुसरी शासकीय अधिकाऱ्याची पत्नी आहे. विधानसभेत गाजला मुद्दा; मुख्यमंत्री आज देणार निवेदन मुंबई | खरातने केलेल्या शोषणावरून विधानसभा सोमवारी प्रचंड गाजली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून मी आज (दि.२४) विधानसभेत त्यावर सविस्तर निवेदन करणार असल्याचे ते म्हणाले. खरात देशाबाहेर पळू नये यासाठी पोलिसांनी १० मार्च रोजीच ‘लूक आऊट सर्क्युलर’ जारी केल्याचे त्यांनी सांगितले. केवळ पैसा साठवला नाही तर गुंतवणूक मालमत्तेत २०२२ मध्ये ९६ लाख असलेली मालमत्ता २०२५ पर्यंत १ कोटी ८१,६५,९३१ रुपयांवर पोहोचली. या हेल्पलाइनवर करा खरातविरोधात तक्रारी ९५०३२७०२२४, ७७७५८१६३८९ खरातविरोधात तक्रार करायची असल्यास उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे, निरीक्षक राहुल मोरे यांच्या एसआयटी पथकाशी उपरोक्त क्रमांकांवर संपर्क साधावा, नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. ‘शिवनिका संस्थान’ची कोट्यवधींची झेप, आधी लाखांची तूट, मग अचानक देणग्यांचा ‘महापूर’ सचिन जैन | खरातच्या मिरगाव येथील ‘श्री शिवनिका संस्थान’च्या पाच वर्षांतील ऑडिट रिपोर्ट ‘दिव्य मराठी’च्या हाती लागला असून त्यातून एका सामान्य देवस्थानचा ‘कॉर्पोरेट’ प्रगतीपर्यंतचा चकित करणारा प्रवास उघड झाला आहे. २०२० ते २०२२ या काळात संस्थानचे उत्पन्न ४.९० लाखांवर होते. १.६० ते १.६४ लाख रुपयांची तूट होती. मात्र २०२४ मध्ये ७६ लाख ९१ हजार ४१६ रुपये उत्पन्न झाले.
सातारा जिल्हा परिषदेत शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या निवडणूकपूर्व आघाडीला बहुमत मिळाले. तरीही त्यांना बाजूला करत भाजपने पोलिस बळाचा वापर करून २० मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर कब्जा केला, असा आरोप झाला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून वाढलेली भाजप-शिंदेसेनेत सुरू असलेली धुसफूस सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उफाळून आली. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचीही भर पडल्याने महायुतीत महाभारत घडले. सत्ताधारीच एकमेकांवर तुटून पडले होते. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यंत्री शिंदे एकाच आसनावर आजूबाजूला बसून परस्परांवर शरसंधान करत असल्याचे दिसले. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात मंत्री सुरक्षित नाहीत. लोकशाहीचा खून झाला आहे, असा थेट आरोप केला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री मकरंद पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला. त्यानंतर विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे (शिंदसेनेच्या नेत्या) यांनी साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशींसह काही पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. त्याला भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी तीव्र आक्षेप घेतल्यावर सभापती राम शिंदे (भाजप नेते) यांनी उपसभापतींचे आदेश राखून ठेवल्याचे संकेत दिले. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. अपहरणाची तक्रार भाजपने शिवसेनेचे (शिंदेसेना) २, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ३ सदस्य फोडले. एका अपक्षाचा पाठिंबा मिळवला. ऐन मतदानापासून काही तास आधी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदस्य दिनकर शिंदे यांचे अपहरण केल्याच्या तक्रारीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच अनिल देसाई, संदीप मांडवे यांना ताब्यात घेतले होते. भाजपचा शिंदेसेनेला स्पष्ट संदेश या वादाच्या माध्यमातून भाजपने शिंदेसेनेला स्पष्ट संकेत दिले की, उपमुख्यमंत्री शिंदेंचा मूळ जिल्हा सातारा असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र, सत्ता नेमकी कशी चालेल याचा निर्णय केवळ भाजपच घेईल. भाजपला डावलून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न झाला, तर तो यशस्वी होऊ दिला जाणार नाही. शिवेंद्रराजे पडद्यामागचे खरे सूत्रधार साताऱ्यात भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंनी सर्व कारवाई केल्याचे दिसते. प्रत्यक्षात साताऱ्याची खडान्खडा माहिती असलेले मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी पडद्यामागून सूत्रे हलवली. त्यांनी पूर्ण रणनीती तयार केली होती. त्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी बळ पुरवल्याने सातारा जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात आली.
शिर्डी येथे साईबाबा संस्थानकडून २५ ते २७ मार्चदरम्यान ११५वा रामनवमी साजरा होणार आहे. या उत्सवासाठी संस्थानने तब्बल १ लाख ६६ हजार ५५० भक्तमंडळ सभासदांना निमंत्रण पत्रिका पाठवल्या आहेत. सुमारे २ लाख देणगीदार साईभक्तांना एसएमएस व ई-मेलद्वारे आमंत्रित केले आहे. या उत्सवासाठी ९५ पालख्यांची नोंदणी झाली आहे. यंदा सुमारे ३ लाख भाविक येण्याचा अंदाज आहे, गेल्या वर्षी अडीच लाख भाविक रामनवमी उत्सवासाठी आले होते. रामनवमी उत्सव काळात शिर्डीत मोठी गर्दी अपेक्षित असल्याने मंदिर परिसरात सुमारे ७५ हजार चौ.फूट मंडप उभारले. भाविकांच्या निवासासाठी साईभक्तनिवास (५०० खोल्या) आणि साईधर्मशाळेत ३७ हजार ५०० चौ.फूट अतिरिक्त कापडी मंडप उभारले आहेत. यात पाणी, वीज, स्वच्छता व सुरक्षा यांची व्यवस्था केली आहे. या वर्षी ९५ पालख्यांची नोंदणी झाली आहे. मुंबई ते शिर्डी मार्गावर कळमवाडी, घोटी, सिन्नर, पांगरी आदी ठिकाणी एकूण १ लाख १२ हजार चौ.फूट मंडप उभारून पदयात्रेकरूंना निवाऱ्याची सोय केली आहे. तसेच १० पाण्याचे टँकर मोफत उपलब्ध केले आहेत. उत्सवादरम्यान कीर्तन, भजन, पालखी व रथ मिरवणुका तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. साईभक्तांनी उत्सवात सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे. विमानतळ, रेल्वे प्रवासालाही भाविकांनी पसंती दिली असल्याने दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद आदी ठिकाणांहून येणाऱ्या व जाणाऱ्या विमानांचे बुकिंग पूर्ण झाले आहे. भक्तांच्या कपाळी अष्टगंध लावण्यासाठी माजी विश्वस्त सचिन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ सज्ज आहेत. २.५० लाखांवर भाविकांना मोफत प्रसादाची व्यवस्था... रामनवमीनिमित्त भाविकांसाठी उदी व बुंदी पाकीटे प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे . गतवेळी दोन लाख भाविकांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. यंदा २.५० लाखांवर भाविकांना मोफत भोजन प्रसादाची व्यवस्था. प्रसादालय सज्ज, पुरेसा गॅससाठा, पर्यायी इंधनाचाही होतोय वापर साई प्रसादालय पूर्ण क्षमतेने सुसज्ज केले आहे. पुरेसा गॅस साठा, पर्यायी इंधन व्यवस्था आणि मनुष्यबळ उपलब्ध ठेवले आहे.उत्सव काळात भाविकांना चहा, नाश्ता आणि जेवणाची गैरसोय होऊ नये यासाठी श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. सुरक्षेसाठी पोलिस, बॉम्बशोधक पथक व द्रुत कृती दलसुरक्षेच्या दृष्टीने पोलिस, संस्थान सुरक्षा, बॉम्ब शोधक पथक व द्रुत कृती दल तैनात राहील. साई संस्थान व पोलिस प्रशासनाकडून १००० पेक्षा अधिक सुरक्षा कर्मचारी तीन शिफ्टमध्ये तैनात करण्यात आले आहे.
चंद्रपूरच्या किडनी रॅकेटचा मुख्य आरोपी असलेल्या डॉक्टरला छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुणाने ५ लाखांत किडनी विकल्याची माहिती ‘दिव्य मराठी’ला मिळाली. ‘किडनी डोनर’ ग्रुपच्या जाळ्यात ‘तो’ अडकला होता. ‘दिव्य मराठी’ने स्टिंग करत सोशल मीडियावर ४८ पेक्षा अधिक ‘किडनी डोनर ग्रुप’ असल्याची धक्कादायक माहिती पुढे आणली आहे. ग्रुपला संपर्क साधताच हैदराबादेतील तिघांनी ५ लाखांत किडनी विकत घेण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे अवैध किडनी रॅकेटचे धागेदोरे हैदराबादेतही असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या संदर्भात विभागीय अवयव दान कक्षाचे माजी प्रमुख डॉ. सुधीर कुलकर्णी म्हणाले, ‘किडनी फक्त दान करता येते, विकता येत नाही. अशा रॅकेटपासून लोकांनी सावध राहावे. यावर पोलिस कारवाई करू शकतात. आम्हाला त्यांच्यावर कारवाईचे अधिकार नाहीत.’ बिहार, तामिळनाडू, हैदराबाद बंगालमध्ये रॅकेट : गरीब, गरजूंचा शोध घेत त्यांची बेकायदेशीरपणे किडनी काढली जाते. तामिळनाडूसह हैदराबाद, प. बंगाल, कोलकाता, बिहार, दिल्लीतील दलाल सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ४८ पेक्षा अधिक डोनर ग्रुप किडनी डोनर ग्रुप } किडनी डोनर्स ग्रुप } इंडियन किडनी ट्रान्सप्लांट ग्रुप } किडनी डोनर्स } किडनी डोनर्स ग्रुप हैदराबाद } किडनी डोनर्स ग्रुप इंडिया } इंडिया किडनी अँड लिव्हर डोनर या नावाने सोशल मीडियावर ४८ पेक्षा अधिक ग्रुप असल्याचे ‘दिव्य मराठी’ने शोधून काढले. २०२४ मध्ये एका युवकाची किडनी काढून ५ लाख दिले संभाजीनगरचा नरेश (नाव बदलले) कर्जबाजारी होता. त्याने ग्रुपवर मेसेज केला. एजंटने त्याच्याशी संपर्क साधला. तामिळनाडूच्या त्रिची शहरात त्याला बोलावले. ८ लाख सांगून सप्टेंबर २०२४ मध्ये त्याची किडनी काढली. नंतर त्याच्या खात्यात ५ लाख जमा केले. उर्वरित रक्कम अद्यापही दिली नाही. खोटी पद्धत 1 ग्रुपवर मेसेज करणाऱ्या डोनरला आधी फेक आयडीवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.2 व्हर्च्युअल कॉलने रक्तगट, वय विचारतात. ५ लाखांचा दर ठरतो. सर्जरीचे खर्च ते करतात.3 भेटीत सर्जरीची तारीख ठरते. तेथील स्टे, येणे-जाणे, औषधोपचाराचा खर्चाची हमी घेतात. खरी पद्धत 1 नोंदणीनंतर युरिन, रक्तगट, मेडिकल हिस्ट्री तपासणी तसेच समुपदेशन केले जाते.2 कुटुंबीयांच्या संमतीनंतर विभागीय समितीद्वारे पैशांचा व्यवहार झाला नसल्याची खात्री होते.3 वय,ओळख, निवासाचा पुरावा घेऊन डोनरची शस्त्रक्रिया होते. ७ दिवसांत सुटी होते. 1. सर्जरीचा खर्च करूदलाल : रक्तगट कोणता ?प्रतिनिधी : A+ आहे.दलाल : मी हैदराबादच्या रुग्णालयातील कर्मचारी आहे.प्रतिनिधी : पैसे किती मिळतील?दलाल : आत्ताच नाही हैदराबादला आल्यावर सांगू, खर्च हॉस्पिटलतर्फे केला जाईल. प्रतिनिधी : पैसे कधी मिळतात?दलाल : ओटीत जाण्यापूर्वी. 2.आधार कार्ड पाठवादलाल : तुम्ही स्वत: डोनर आहात की दलाल आहात?प्रतिनिधी : नाही, डोनर आहे.दलाल : तुमचे शहर कोणते आहे. रक्तगट कोणता आहे?प्रतिनिधी : पुणे, रक्तगट A+दलाल : ५ लाख रुपये देऊ.आधार आणि फोटो पाठवा.प्रतिनिधी : थोडे आणखी वाढवा.दलाल : एवढेच पैसे मिळणार. 3.आरोग्याची गॅरंटीदलाल : तुमचे वय, रक्तगट आणि तुम्ही कुठे राहता?प्रतिनिधी : पुण्यात राहतो. रक्तगट A+ असून वय ३७ आहे.दलाल : प्रवास अन् राहण्याचा खर्च आम्ही करू. ५ लाख देऊ.प्रतिनिधी: जीवास धोका असेल?दलाल : नाही, आमचे हॉस्पिटल चांगले आहे. भविष्यातही अडचण येणार नाही याची गॅरंटी असते.
वडिलांनी मोबाइल चेक केल्याने मुलीची आत्महत्या:पुण्यातील घटना, 16 वर्षीय मुलीने विष घेतले
वडिलांनी मोबाइल चेक केल्याच्या कारणावरून एका १६ वर्षीय मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना जाधववाडी, चिखली येथे घडली. प्रतीक्षा अनिल गायकवाड (१६, रा. जाधववाडी, चिखली) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्च रोजी प्रतीक्षाचा मोबाइल तिच्या वडिलांनी तपासला. मात्र, त्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच आढळून आले नाही. वडिलांनी आपला मोबाइल तपासल्यामुळे आलेल्या नैराश्यातून प्रतीक्षाने त्याच दिवशी रात्री नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरात विष प्राशन केले. ही बाब तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिला त्वरित जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रविवारी (२२ मार्च) रात्री तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी चिखली पोलिस सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे सांगण्यात आले. नैराश्यातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी येथील अंकुर कॉलनी परिसरात एका तरुणाने नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (२३ मार्च) सकाळी उघडकीस आली. सचिन नागनाथ रसाळ (२०, रा. अंकुर कॉलनी, रहाटणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. काळेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सचिन याच्या मैत्रिणीने काही दिवसांपासून त्याच्याशी बोलणे बंद केल्याने तो नैराश्यात गेला होता. त्यातूनच त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना उघड झाली आहे. काळेवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.
दुधामध्ये पाण्याची आणि घातक पदार्थांची भेसळ करून लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध आता “मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिले. अंधेरीतील दूध भेसळ प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर मंत्र्यांनी संबंधित घोषणा सभागृहात केली. आमदार मनीषा कायंदे यांनी अंधेरीतील भेसळयुक्त कारवाईच्या अनुषंगाने राज्याच्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध व सुरक्षित दूध पुरवठा होणे आवश्यक असताना मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री झिरवाळ यांनी मुंबईतील कारवाईविषयी उत्तर देताना सांगितले की, वर्सोवा पोलिस ठाण्याच्या पथकासह ७ ठिकाणी छापा टाकला असता दूध भेसळीचा प्रकार उघड झाला. त्या वेळी निदर्शनास आले की, अमुल आणि गोकुळ ब्रँडमध्ये भेसळ झाल्याचे समोर आले. यात दूध भेसळीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले. तसेच या प्रकरणात १४ जणांना अटक करून ४ जणांना तडीपार करण्यात आले आहे. आमदार भाई जगताप आणि अनिल परब यांनी या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. हा केवळ भेसळीचा प्रकार नसून लोकांच्या जिवाशी खेळ आहे. हे संघटितपणे सुरू असेल तर सरकार दोषींना मकोका का लावत नाही ? तुम्ही अधिकाऱ्यांना वाचवत आहात का? असा संतप्त सवाल सदस्यांनी विचारला. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर मंत्री झिरवाळ यांनी मकोकांतर्गत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनातील रिक्त पदांच्या मुद्द्यावरही मंत्र्यांनी माहिती दिली. प्रशासनात सध्या मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. एकूण २५४४ पदांची गरज असताना १२७३ पदे रिक्त आहेत. या पदभरतीची फाइल वित्त विभागाकडे पाठवण्यात आली आहे. त्रुटी दूर करून लवकरच नवीन आकृतिबंधानुसार ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अलीकडेच १९७ जणांची भरती झाली असून त्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले असल्याचे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले आहे. भेसळखोरांवर वचक बसेल ‘मकोका’ मुळे दूध भेसळ ही केवळ भेसळ न राहता ‘संघटित गुन्हेगारी’मानली जाईल. यामुळे आरोपींना सहजासहजी जामीन मिळणार नाही आणि दोषसिद्धी झाल्यास जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. गुन्हेगारांच्या मालमत्ता जप्त होऊन रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणे पोलिसांना सोपे होईल, ज्यामुळे अशा जीवघेण्या धंद्यांवर वचक बसून सार्वजनिक आरोग्य सुरक्षित राहील. आरोपींना आता सहजासहजी जामीन मिळणार नाही, ज्यामुळे तपासात अडथळे येणार नाहीत. दोषसिद्धी झाल्यास गुन्हेगारांना थेट जन्मठेपेपर्यंतच्या कठोर कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे भेसळघोखारांची आता खैर राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. दूध उत्पादनात ६३.८ टक्क्यांची वाढ आर्थिक पाहणी अहवालानुसार, महाराष्ट्रातील दूध उत्पादन सन २०१५-१६ मधील सुमारे १०१.५२ लाख मेट्रिक टनांवरून वाढत, सन २०२४-२५ मध्ये तब्बल १६६.२६ लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या दशकात ६३.८ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. त्याचबरोबर दरडोई दूध उपलब्धतेतही सुधारणा झाली असून प्रतिदिन २३९ ग्रॅमवरून ३८५ ग्रॅमपर्यंत वाढ झाली असून ४९.८ टक्के वाढ दर्शवते. पश्चिम महाराष्ट्र, नाशिक आणि पुणे विभाग आघाडीवर असून कोकण व विदर्भातील काही भागातही उत्पादनात वाढ होत आहे. मार्च २०२५ अखेर सहकारी संस्थांमार्फत दररोज सुमारे ५८.२५ लाख लिटर दूध संकलित होत असून खासगी डेअऱ्यांमधूनही मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे.
मराठवाड्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीचा आणि प्रशासकीय त्रुटींचा भीषण फटका गरोदर महिलांना बसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदार संतोष दानवे (भोकरदन) आणि धनंजय मुंडे (परळी) यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून ही विदारक आकडेवारी उघड झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ या काळात नैसर्गिक गर्भपातांच्या प्रमाणात तब्बल ४३.४९% वाढ झाली असून संपूर्ण मराठवाड्यात ही वाढ सरासरी २१% इतकी नोंदवण्यात आली आहे. अतिवृष्टीने ६१३६ गर्भांचा बळी गेला. आमदार संतोष दानवे आणि धनंजय मुंडे यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरले. “जून ते सप्टेंबर २०२५ या काळात सरासरीपेक्षा १६० टक्के अधिक पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पुरामुळे रस्ते बंद झाले, घराघरांत पाणी शिरले आणि गरोदर मातांना प्रचंड शारीरिक ओढाताण व मानसिक ताण सहन करावा लागला. वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने अनेक बालमृत्यू झाले, हे शासन मान्य करते का? ग्रामीण भागातील औषधांचा तुटवडा आणि कुपोषणामुळे आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे का?’ असा थेट सवाल आमदारांनी उपस्थित केला. प्रशासनाने केला दावा : लातूर-जालन्यातील ट्रॅकिंग’यशस्वी शासकीय यंत्रणा सक्षम असल्याचा दावा करताना मंत्र्यांनी माहिती दिली की, लातूर परिमंडळातील पूरग्रस्त गावांमधील ४५८ गरोदर मातांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत वेळेवर तपासणी करण्यात आली. १०२ आणि १०८ रुग्णवाहिका अहोरात्र कार्यरत होत्या. जालन्यातील एका घटनेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, पुराच्या पाण्यात अडकलेल्या दीपाली कांबळे या गरोदर महिलेला आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुरक्षित बाहेर काढून तिची जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती केली. सध्या माता आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मंत्री आबिटकरांना आकडेवारी मान्य, पण त्रुटी लावल्या फेटाळून या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी एचएमआयएस प्रणालीचा दाखला देत आकडेवारी स्पष्ट केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ८५२ ने वाढ होऊन गर्भपाताची संख्या २८११ वर पोहोचली आहे, तर संपूर्ण मराठवाड्यात हा आकडा ६१३६ इतका झाला आहे. मात्र, मंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेच्या त्रुटींचा आरोप फेटाळून लावला. “पुरामुळे दवाखान्यात पोहोचता आले नाही किंवा औषधांचा तुटवडा होता, अशा स्वरूपाच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या नाहीत.
शिवकालीन ठेवा जपतायत छत्रपतींच्या वकिलांचे वंशज
अॅड. डॉ. विजयसिंह जाधव सोलापूर : पुण्यातील पोलिस दलात सेवेत कार्यरत असलेले काजी सोहेल शमशुद्दीन शेख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्ठप्रधान मंडळातील दरबारात सचिव आणि वकील काजी हैदर यांचे वंशज आहेत. काजी सोहेल शमशुद्दीन शेख यांच्याकडे आजही शिवकालीन वैभव जपलेले आहे. त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्ठप्रधान मंडळातील दरबारात काजी हैदर यांनी सचिव व […] The post शिवकालीन ठेवा जपतायत छत्रपतींच्या वकिलांचे वंशज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
५ दिवसांसाठी स्थगिती, ९ एप्रिलला युद्ध थांबणार : ट्रम्प वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वतील संघर्षाबाबत २ दिवस सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत इराणचे वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले ५ दिवस स्थगित केल्याचे जाहीर केले आणि अमेरिकन संरक्षण विभागाला लष्करी हल्ले थांबवण्याचे निर्देश दिल्याचे ते म्हणाले. दरम्यान, अमेरिकेने इराणसोबतचे […] The post इराणवरील हल्ले स्थगित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपुरात संघाच्या मुख्यालयावर मोर्चा
वंचित, काँग्रेस नेते एकवटले, मोदींविरोधात घोषणाबाजी नागपूर : वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने संयुक्तपणे आज नागपुरात विशाल मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात असंख्य लोक सहभागी झाले होते. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी मोदी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी […] The post नागपुरात संघाच्या मुख्यालयावर मोर्चा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तीन महिन्याचे वेतन देयक तयार करून अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेतल्याचा मोबदला म्हणून एक हजार रुपयाची लाच घेताना पूर्ण पाटबंधारे विभाग वसमत येथील वरिष्ठ लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी 23 सायंकाळी रंगेहात पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्ण पाटबंधारे विभागाच्या सिंचन व्यवस्थापन विभागातील एका कर्मचाऱ्याचे जुलै ऑगस्ट व सप्टेंबर 2025 या कालावधीत असलेले वेतन देयक थकीत होते. सदर वेतन देयक देण्यासाठी त्यांनी पूर्णा पाटबंधारे विभागाकडे मागणी केली होती. त्यानुसार पाटबंधारे विभागातील वरिष्ठ लिपिक सलीम अब्दुल अहमद शेख याने त्यांची वेतन देयक तयार करून त्यावर उपकार्यकारी अभियंत्यांची स्वाक्षरी घेतली होती. तसेच सदर देयक कोषागार कार्यालयात सादर करण्यात आले होते. या कामाचा मोबदला म्हणून वरिष्ठ लिपिक सलीम शेख याने एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावरून संबंधित कर्मचाऱ्याने हिंगोली येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची आज दुपारी पंचा समक्ष पडताळणी करण्यात आली होती. यामध्ये सलीम शेख यांने एक हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते त्यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक विकास घनवट पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सुलभा राऊत, जमादार भगवान मंडलिक, रवींद्र वरणे, सय्यद युनूस, शेख अकबर, राजाराम फुफाटे, गजानन पवार यांच्या पथकाने वसमत येथील पूर्ण पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात सायंकाळी सापळा रचला होता ठरल्याप्रमाणे सायंकाळी वरिष्ठ लिपिक सलीम शेख याने एक हजार रुपये लाच घेताच पोलिसांनी त्यास रंगेहात पकडले. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोफत प्रवेशासाठी दुप्पट अर्जांची नोंदणी
लातूर : प्रतिनिधी आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेश मिळावा म्हणून जिल्हयातील स्वंय अर्थसहित, विना अनुदानित अशा २०७ शाळांनी नोंदणी केली होती. या नोंदणी झालेल्या शाळेत २ हजार ३४३ मोफत प्रवेश दिले जाणार असून आज पर्यंत ५ हजार ७५८ पालकांनी पाल्यांचे प्रवेश करण्यासाठी ऑलाईन अर्जांची नोंदणी केली आहे. २५ टक्के मोफत प्रवेशाच्या […] The post मोफत प्रवेशासाठी दुप्पट अर्जांची नोंदणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महसूल खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे रविवारी वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात निवृत्त उपायुक्त सुरेशकुमार इंगोले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आता तुम्ही स्वतःसाठी जगा, तब्येतीची काळजी घ्या आणि स्वतःला कोणत्यातरी कामात गुंतवा. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंगोले बोलत होते. यावेळी प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. अजय खांदेवाले, कोषागार कार्यालयातील निवृत्ती वेतन विभागाचे सहायक संचालक अमोल इखे, निवृत्त तहसीलदार किशोर गावंडे व गजभिये, तसेच संस्थेचे सचिव मधुकरराव गाडगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. इंगोले यांनी सर्व सत्कारमूर्तींना उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या आणि संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होण्याचे आश्वासन दिले. नेत्रतज्ज्ञ डॉ. खांदेवाले यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यावर सखोल मार्गदर्शन केले. नेत्रविकारांशी संबंधित अडचणी सोडवण्याचे आश्वासन देताना, त्यांची आई महसूल खात्यातून निवृत्त झाल्यामुळे हा विभाग त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा असल्याचे त्यांनी सांगितले. कोषागार विभागाचे सहायक संचालक अमोल इखे यांनी उपस्थितांना संबोधित करताना आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, त्यांची नेमणूक सेवानिवृत्तांच्या सेवेसाठीच झाली आहे. सध्या बहुतेक सेवा ऑनलाइन झाल्यामुळे कार्यालयात येण्याची गरज भासू नये, असा त्यांचा प्रयत्न आहे. कोणतीही अडचण आल्यास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत ती सहज सोडवली जाते, असेही त्यांनी नमूद केले. इखे यांनी सायबर फसवणुकीपासून वाचण्याचे उपाय सांगितले आणि तालुका पातळीवर शिबिरे घेण्याची तयारी दर्शवली. निवृत्त नायब तहसीलदार किशोर कनाटे यांच्या कन्या प्रा. मेघा कनाटे यांनी सत्कारमूर्तींबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सुमारे ४० ज्येष्ठांचा त्यांच्या कुटुंबीयांसह सत्कार करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि ज्येष्ठ साहित्यिक अलका सप्रे लिखित वृद्धत्व जपताना हे पुस्तक भेट देण्यात आले. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाकडून 'ग्रामगीताचार्य' ही पदवी प्राप्त झालेले विजयराव बोके यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे पदाधिकारी रवींद्र डाखोरे, ढोणे, गोळवलकर, सुभाष वर्मा, वितोंडे, कोडापे, रामभाऊ राठोड आदींनी अतिथींचे स्वागत केले. संस्थेचे सचिव वीरेंद्रसिंह दीक्षित यांनी प्रास्ताविक व संचालन केले. त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचे विश्लेषण करत भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. अनिल पाटील यांनी आभार मानले.
अमरावती येथे महिला काँग्रेसने रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कुप्रसिद्ध भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या चाकणकर यांनी नुकताच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, हे प्रकरण केवळ राजीनाम्यावर संपणार नाही, असे म्हणत काँग्रेसने त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. या मागणीसाठी अमरावती शहर काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष जयश्री वानखडे यांच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी रुपाली चाकणकर यांच्या छायाचित्राला चपलेने मारले. जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदनही सादर करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात या भोंदूबाबाला तंत्र-मंत्र विद्या आणि दैवी शक्तीचा हवाला देत महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचे आणि त्यांच्या संस्थेतही त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. या खुलास्यानंतर चाकणकर यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. असे असले तरी, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून फसवणुकीच्या अनेक प्रकरणांच्या अनुषंगाने त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनात महिला काँग्रेसच्या पदाधिकारी नगरसेविका डॉ. अर्चना आत्राम, राजश्री जठाळे, मालती गवई यांच्यासह आरती पिंपळे, वंदना निर्गुडे, सीमा तिवारी, शेख शाहीन, किरण चांदवकर आणि आरती क्षीरसागर आदी महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
चालू आर्थिक वर्ष संपायला काहीच दिवस शिल्लक असल्याने अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांवर निर्बंध लावले आहेत. हे निर्बंध २६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीसाठी लागू राहतील. आर्थिक वर्ष संपुष्टात येत असल्याने या काळात शासन स्तरावरून अनेक आर्थिक व्यवहार होतात. विविध खात्यांतील योजनांचा निधीही याच काळात प्राप्त होतो. तसेच, रखडलेल्या कामांवर झालेल्या खर्चाची मागणी व पुरवठादेखील मार्च एंडिंगच्या काळातच केला जातो. अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे यापैकी कोणतीही बाब अडकू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण, आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण, समाज कल्याण आणि इतर विभागांच्या अनेक लोकोपयोगी योजना आहेत, ज्यांच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनांचा काही निधी याच काळात जिल्हा परिषदेला प्राप्त होणार आहे. वास्तविक, २६ मार्च ते ३१ मार्च या काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुट्ट्या घेऊ नयेत, असे शासनाचेच निर्देश आहेत. त्यामुळे विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्हा परिषदेच्या सीईओंना तसे निर्देश दिले आहेत. यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोणतीही रजा अनुज्ञेय राहणार नाही, असा स्पष्ट उल्लेख आहे. या निर्बंधांमुळे, एखादवेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुटीवर जावे लागल्यास कसे करायचे, असा सवाल काही कर्मचारी संघटनांनी उपस्थित केला आहे.
अमरावती जिल्हा परिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज, मंगळवारी सादर होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अर्थसंकल्प सुमारे ३५ कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत सध्या लोकनियुक्त पदाधिकारी नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांना प्रशासकाचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे त्या स्वतः हा अर्थसंकल्प सादर करतील. यासाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात दुपारी १२ वाजता एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा अमरावतीच्या वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार, त्यांच्या कार्यालयातील इतर अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे विविध विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत. बांधकाम, समाज कल्याण, दिव्यांग कल्याण, महिला व बालविकास, कृषी व पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन, पंचायत आणि शिक्षण विभाग यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमार्फत राबविल्या जाणाऱ्या लोकोपयोगी योजनांची माहिती या अर्थसंकल्पातून स्पष्ट होईल. गतवर्षी जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक सुमारे ३० कोटी रुपयांचे होते. यावर्षी काही नवीन योजनांचा समावेश केल्यामुळे २०२६-२७ चे अंदाजपत्रक सुमारे ३५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या अर्थसंकल्पाची तयारी गेल्या १५ दिवसांपासून सुरू आहे. प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार यांनी सर्व विभागांना पत्र पाठवून त्यांच्या मागण्या मागवल्या होत्या. १२ मार्च रोजी सीईओ महापात्र यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन प्रत्येक विभागाची मागणी निश्चित केली होती. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून या मागण्या आणि त्यासाठी प्रशासनाने केलेली तरतूद स्पष्ट होणार आहे.
आज महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलसाठी अमरावतीत मंगळवारी मतदान होणार आहे. अमरावती वकील संघाचे २२०० हून अधिक सदस्य या प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र आहेत. यावर्षीच्या निवडणुकीत अमरावतीतून एकही स्थानिक उमेदवार नसल्याने, अकोला, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातील उमेदवारांचे लक्ष येथील मतदारांच्या कौलाकडे लागले आहे. मतदान प्रक्रिया जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिल्या माळ्यावरील कक्ष क्रमांक १२६ मध्ये मंगळवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडेल. २५ सदस्यीय महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलची निवडणूक दर पाच वर्षांनी होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणामुळे ही निवडणूक तब्बल आठ वर्षांनी आयोजित केली जात आहे. या दरम्यानच्या काळात जुन्याच पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. अमरावती वकील संघाच्या मतदार यादीला तीन टप्प्यांमध्ये विभागले आहे: सन १९९० पूर्वीचे वकील, सन १९९० नंतरचे वकील आणि नवीन वकील (फ्रेशर्स). या तिन्ही टप्प्यांतील मतदारांना निवडणुकीची माहिती देण्यात आली असून, ते सर्वजण मतदानात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. निवडणुकीची संपूर्ण तयारी महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलतर्फे केली जाते. मतपत्रिका आणि इतर आवश्यक साहित्यही त्यांच्याकडूनच पाठवले जाते. जिल्हा व सत्र न्यायालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग त्यांना आवश्यक ते सहकार्य पुरवत आहेत. यावर्षीच्या निवडणुकीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, पहिल्यांदाच महिलांसाठी पाच जागा अनिवार्य करण्यात आल्या आहेत. यापैकी तीन सदस्यांची निवड मतदानाद्वारे होईल, तर उर्वरित दोन सदस्यांचे नामांकन केले जाईल. याशिवाय, महिलांना सामान्य मतदारसंघातूनही निवडणूक लढवण्याची संधी आहे. अमरावतीने महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलला आतापर्यंत तीन अध्यक्ष दिले आहेत. यामध्ये ज्येष्ठ वकील रमेश पाध्ये (जे पुढे न्यायमूर्ती झाले), डी. आर. उर्फ आप्पासाहेब कुळकर्णी आणि अलीकडच्या काळातील ज्येष्ठ विधीज्ञ प्रदीप महल्ले यांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यातील बेरार एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी ॲड. मोतीसिंह मोहता यांनीही अध्यक्षपद भूषवले आहे. पूर्वी सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर इतर सदस्यांच्या सहमतीने अध्यक्षपदी विराजमान होण्याची प्रक्रिया होती.
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याने महिलांवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावती विधानसभा युवक काँग्रेसने जाहीर निषेध नोंदवला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सोमवारी, २३ मार्च रोजी सायंकाळी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे केंद्रीय पदाधिकारी भय्या पवार, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगळे आणि अमरावती विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख यांनी केले. आंदोलनात युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. युवक काँग्रेसने शासनाकडे पीडित महिलांना तात्काळ न्याय मिळावा आणि अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कठोर कारवाई न झाल्यास युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून याहून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनादरम्यान, महिलांवरील अत्याचार बंद करा, दोषींना अटक करा, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील अशा घोषणा देण्यात आल्या. युवक काँग्रेसच्या मते, राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या आंदोलनात आशिष यादव, प्रियाल मोहोड, कौस्तुभ देशमुख, श्रेयस धर्माळे, वेदांत केने, मोहित भेंडे, धनंजय बोबडे, चैतन्य गायकवाड, आकाश दुराटकर, आकाश गेडाम, शुभम बांबल, मनन अत्री, शंतनु हिवसे, शंतनु देशमुख, कृणाल गावंडे आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या अभूतपूर्व गोंधळाचे आणि राड्याचे पडसाद आता राज्यस्तरावर उमटू लागले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले असून, या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. साताऱ्यातील या घटनेचा परिणाम राज्य सरकारच्या स्थिरतेवर होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी सोशल मीडिया 'एक्स'वर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची निवडणूकपूर्व आघाडी होती आणि त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत असतानाही भाजपने ज्या पद्धतीने सत्ता बळकावण्याचा प्रयत्न केला, तो लोकशाहीवरील काळा डाग आहे. महाराष्ट्राचे राजकारण नक्की कोणत्या थराला गेले आहे, हे यातून स्पष्ट होत आहे. यशवंत विचारांना हरताळ फासल्याचा आरोप साताऱ्याच्या राजकीय वारशाचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला घेरले. यशवंतराव चव्हाणांच्या सातारा जिल्ह्यातच जर लोकशाहीची अशा प्रकारे हत्या होत असेल, तर राजकारणाची पातळी किती खालावली आहे हे दिसते. केवळ सत्ता मिळवणे हेच सर्वस्व मानून महाराष्ट्राचा 'यशवंत विचार' संपवण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह या राड्यादरम्यान पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची भूमिका अत्यंत संशयास्पद आणि गंभीर प्रश्न उपस्थित करणारी होती, अशी टीकाही माजी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. प्रशासनाने निष्पक्षपातीपणे काम करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतल्यानेच हा प्रकार घडल्याचे त्यांनी सुचवले आहे. दरम्यान, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने (प्रसारमाध्यमांनी) हे सत्य धाडसाने समोर आणल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. हे ही वाचा… भाजपची शिवसेनेवर कुरघोडी?:पोलिस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनावरून रंगले राजकारण; राम शिंदेंनी उपसभातींचा निर्णय फिरवला सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा वाद आता राज्याच्या विधिमंडळात पोहोचला. सत्ताधारी शिवसेनेने या निवडणुकीवेळी मंत्री व कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप केल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले. पण भाजपने या निर्देशांवर जोरदार आक्षेप घेतला. त्यांनी सभापती राम शिंदे यांच्याकडे दोशींचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. सभागृहात चर्चा झाल्यानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी उपासभापती निलम गोऱ्हे यांचा निर्णय ठेवत, एकप्रकारे एसपी दोशी यांच्या निलंबनाला स्थगिती दिली. सविस्तर वाचा…
स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्यावरील नव्या आरोपांमुळे पाथर्डीत संतापाची लाट उसळली आहे. खरातसोबत जमिनीचा व्यवहार केल्यानंतर आपला मुलगा बेपत्ता झाला असल्याचा दावा एका स्थानिक शेतक-याने केला आहे. खरातवर आधीच लैंगिक शोषण आणि जादुटोण्याच्या (अघोरी विद्या) प्रयोगांचे अनेक आरोप असून त्याची चौकशी सुरू आहे त्यातच या नव्या तक्रारीमुळे तपासाची तीव्रता अधिक वाढली आहे. नाशिकच्या पाथर्डी परिसरातील […] The post खरातचा पाय खोलात! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मानवी डॉक्टरप्रमाणे शेतकरी हा शेतीचा डॉक्टर
शिरूर ताजबंद : वार्ताहर शेतकरी हा शेतीचा डॉक्टर आहे. शेतक-यांना पीक बघून शेतीला काय द्यायचे आहे किंवा काय बदल करायचे आहेत हे आपोआप समजत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद कृषी महाविद्यालय येथे २००५ ते ०७ या वर्षातील माजी विद्यार्थ्यांच्या स्रेह मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […] The post मानवी डॉक्टरप्रमाणे शेतकरी हा शेतीचा डॉक्टर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महापूर ग्रामपंचायतीची वाटचाल पुरस्काराच्या दिशेने
रेणापूर : प्रतिनिधी लातूर तालुक्यातील महापूर ग्रामपंचायतीने सर्वांगीण विकासाच्या विविध उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी करीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात आघाडी घेतली असून, पुरस्कार मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीमार्फत गावात मूलभूत सुविधांची प्रभावी अंमलबजावणी, स्वच्छता अभियानात सातत्य, तसेच लोकोपयोगी योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. जिल्हा व तालुका स्तरावरील पथकाने नुकतेच महापूर ग्रामपंचायतीचे मूल्यांकन […] The post महापूर ग्रामपंचायतीची वाटचाल पुरस्काराच्या दिशेने appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सक्षम व सुजाण समाज निर्मितीसाठी वाचनाची सवय आवश्यक
लातूर : प्रतिनिधी बदलत्या काळानुसार सक्षम व सर्वार्थाने समृद्ध समाज निर्माण करणे ही काळाची गरज बनली असून, यासाठी प्रत्येकाने विविध प्रकारचे साहित्य वाचनाची आवड जोपासावी, असे प्रतिपादन ‘रीड लातूर’ उपक्रमाचे संस्थापक धिरज विलासराव देशमुख यांनी केले. बाभळगाव येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल वाटपाच्या कार्यक्रमात धिरज देशमुख बोलत होते. वाचन संस्कृती जोपासण्याच्या […] The post सक्षम व सुजाण समाज निर्मितीसाठी वाचनाची सवय आवश्यक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘नारीरत्न’ पुरस्काराने २५ महिला सन्मानित
लातूर : प्रतिनिधी मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा नारीरत्न पुरस्कार येथील तब्बल २५ महिलांना प्रदान करण्यात आला असून ‘एकमत’च्या कर्मचारी नंदिनी राजकुमार जाधव(गोरे) यांनाही सन्मानित करण्यात आले. मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड तर्फे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नारीरत्न पुरस्कार सोहळा २०२६ नुकताच पार पडला. स्वत:च्या क्षेत्रात अनेक संकटांना सामोरे जाऊन स्वत:च्या […] The post ‘नारीरत्न’ पुरस्काराने २५ महिला सन्मानित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूरमध्ये १५ संस्था करणार ‘हरित जागर’
लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांचा वाढदिवस आणि जागतिक वनदिन एकत्रीत साजरा करण्याचा अनोखा उपक्रम मांजरा परिवारातील विविध संस्था तसेच महानगरपालीका आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वृक्षारोपणाचा मोठा उपक्रम राबविला. या संस्थानी आपल्या नेत्याच्या वाढदिवसादीवशी वृक्षारोपन करुन हजारो झाडे लावण्याचा आणि संगोपन करण्याचा संकल्प केला. त्यानिमित्ताने १५ संस्था […] The post लातूरमध्ये १५ संस्था करणार ‘हरित जागर’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीचे सदस्य फोडून बाजी मारल्याने जोरदार धुमश्चक्री झाली होती. यावेळी पोलिसांनी पालकमंत्री शंभूराजे देसाई व राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांच्याविरुद्ध बळाचा वापर केल्याने त्याचे तीव्र पडसाद विधीमंडळात उमटले. शिवसेनेच्या मंत्री, आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन करून घोषणाबाजी केली. यानंतर विधानपरिषदेत शिवसेना व राष्ट्रवादीच्या […] The post महायुतीत घमासान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासात हलगर्जी होतेय
मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला विलंब होत असून अजूनही व्हीएसआर कंपनीच्या मालकावर कारवाई झालेली नाही. व्हीएसआर कंपनीविषयी तक्रारी असूनही कंपनीवर सरकार मेहरबान का आहे? या कंपनीला अद्याप काळ्या यादीत का टाकले नाही? असे सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चेतन तुपे यांनी सोमवारी विधानसभेत अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासात हलगर्जी […] The post अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासात हलगर्जी होतेय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आपल्या आक्रमक आणि अनेकदा वादग्रस्त ठरणाऱ्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. माझं जवळपास ३५ कोटी रुपयांचं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं, म्हणूनच आज माझ्यासोबत सायकलवर फिरणारा कार्यकर्ता फॉर्च्युनर कारमध्ये फिरत आहे, अशी जाहीर कबुलीच संजय गायकवाड यांनी दिली आहे. या विधानामुळे राजकीय क्षेत्रातील 'कमिशन संस्कृती' आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून, राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे. चिखली मतदारसंघातील विविध पक्षांच्या सुमारे ६०० कार्यकर्त्यांनी रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. बुलढाणा येथील आमदार गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा सोहळा पार पडला. यावेळी नूतन कार्यकर्त्यांचे स्वागत करताना आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या प्रगतीचे दाखले देताना संजय गायकवाड यांनी थेट कोट्यवधी रुपयांच्या कमिशनचा उल्लेख करत कार्यकर्त्यांना आर्थिक ताकद दिल्याचा दावा केला. नेमके काय म्हणाले संजय गायकवाड? आमदार संजय गायकवाड भाषणात म्हणाले की, “शिवसेना आता सत्तरीच्या उंबरठ्यावर आहे. चिखली मतदारसंघ एकेकाळी अतिशय मजबूत होता, पण हळूहळू कार्यकर्ता विखुरला गेला. मी महाराष्ट्रातील एक ताकदवर आमदार आहे आणि कुणालाही घाबरत नाही. आमची ताकद ही कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आहे. माझ्या मतदारसंघातील एकही माणूस सांगणार नाही की आम्ही कोणाचा छळ केला. उलट, माझ्यासोबत जे कार्यकर्ते कधीकाळी सायकलवर असायचे, त्यांना मी फॉर्च्युनरपर्यंत पोहोचवले आहे. यासाठी मी माझे ३५ कोटींचे कमिशन कार्यकर्त्यांच्या हितासाठी खर्च केले.” राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण एका लोकप्रतिनिधीने जाहीर व्यासपीठावरून 'कमिशन' मिळाल्याची आणि ते वाटल्याची कबुली दिल्याने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. हे कमिशन नेमके कोणत्या कामातून आले आणि ते अशा प्रकारे वाटणे कायदेशीर आहे का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. संजय गायकवाड यांनी कार्यकर्ते स्ट्राँग झाले की आम्ही स्ट्राँग होतो, असे सांगत आपल्या कृतीचे समर्थन केले असले, तरी विरोधकांच्या हाती मात्र यामुळे मोठे कोलीत मिळाले आहे.
केंद्र सरकारने देशभरातील सीएनजी प्रकल्पांशी संबंधित कामांना प्राधान्याने गती देण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, एलपीजी पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी दूर करून नागरिकांना अखंडित सेवा देण्यावरही भर देण्यात आला आहे. ही माहिती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि पेट्रोल डीलर असोसिएशनचे राष्ट्रीय सदस्य अली दारूवाला यांनी दिली. केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून सीएनजी पायाभूत सुविधा उभारणीतील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये पाइपलाइन टाकणे, परवानग्या मिळवणे, रस्ते खोदकाम मंजुरी आणि विविध विभागांमधील समन्वयावर विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. तसेच, एलपीजी पुरवठ्याबाबत काही भागांत निर्माण होणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वितरण व्यवस्थेत सुधारणा करून ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये गॅसची उपलब्धता सुरळीत ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून नागरिकांना सुरक्षित, परवडणारी आणि अखंडित ऊर्जा सेवा उपलब्ध करून द्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात काही सोसायट्यांना थेट पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा केला जातो. महानगर गॅस लिमिटेडने यासाठी पुढाकार घेतला आहे. हडपसर भागात पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याची योजना आहे, परंतु पुलगेट येथे सायकल ट्रॅक खोदायचा की नाही या वादात हे काम रखडले आहे. या प्रकल्पामुळे ९ लाख नागरिकांना आणि २५ हजार रिक्षा चालकांना गॅस मिळणार आहे. महानगर गॅस लिमिटेड कंपनी महापालिकेकडे पैसे भरण्यास तयार आहे, मात्र पालिका प्रशासन दाद देत नाही. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटला नाही. सध्या गॅस पुरवठ्यात अडथळे आल्यास एस्मा कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेने यावर तात्काळ मार्ग काढावा, अशी मागणी अली दारूवाला यांनी केली आहे.
माजी खासदार तथा माजी राज्यमंत्री दत्ताजी मेघे यांच्या पार्थिवावर त्यांच्या जन्मगावी पवनार येथे आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्यविधीला उपस्थित होते. दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, खासदार अमर काळे, आमदार अभिजित वंजारी, आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, आमदार चरण ठाकूर, माजी मंत्री रणजित देशमुख, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, जिल्हाधिकारी वान्मथी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्यासह माजी खासदार, आमदार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दत्ताजी मेघे यांचे काल नागपूर येथे निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पार्थिवाचे दर्शन घेतले होते. आज मुख्यमंत्र्यांनी अंत्यविधीला उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पोलिस दलाच्यावतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अन्य मान्यवरांनी दत्ताजी मेघे यांच्या पत्नी शालिनीताई दत्ताजी मेघे, पुत्र सागर मेघे व आ.समीर मेघे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. वर्धा जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते, नागरिक दत्ताजी मेघे यांच्याशी जुळले होते. त्यांनी माझ्यासारखे अनेक आमदार, खासदार घडविले. राजकारणापेक्षा समाजकारणावर त्यांचा अधिक भर होता. प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी हे दाखवून दिले. त्यांच्या जाण्याने सामाजिक, राजकीय क्षेत्रासह वर्धा जिल्ह्याचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे, असे यावेळी शोक संवेदना व्यक्त करतांना राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.
तरुणांनी तंबाखू, गुटखा, दारू यांसारख्या व्यसनांपासून दूर राहून परमेश्वराचे नामस्मरण करावे, त्यातूनच खरे सुख आणि समाधान मिळते व जिवन समृद्ध होते असे आवाहन प.पू. रमेश भाई ओझा यांनी सोमवारी ( ता. 23) रोजी येथे केले. येथील रामलीला मैदानावर गजराज बाल गणेश मंडळाच्या पुढाकारातून प. पू.भाईश्री रमेश भाई ओझा यांचे श्रीमद भागवत कथा वाचन होत आहे. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, आजच्या काळात अनेक तरुण तंबाखू, गुटखा, दारू यांसारख्या घातक व्यसनांच्या आहारी जात आहेत. या व्यसनांमुळे प्रकृती वर मोठा परिणाम होतो. मानसिक संतुलन बिघडून आयुष्याचे नुकसान होते. केवळ व्यसनाधिन व्यक्तीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंब या व्यसनांच्या परिणामामुळे दुःखी होते. त्यामुळे व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. ते पुढे म्हणाले की, व्यसनामुळे माणसाचे आरोग्य, आर्थिक स्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात येते. व्यसनातून क्षणिक आनंद मिळतो, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात,” असेही त्यांनी स्पष्ट केले. याउलट, भगवंताचे नामस्मरण केल्यास मन शांत होते, विचार शुद्ध होतात आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. तसेच नामस्मरणामुळे आत्मिक समाधान लाभते व व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो, असे त्यांनी सांगितले. तरुणांनी व्यसनमुक्त जीवन जगून समाजासाठी आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.
हिंगोली झेडपीत अखेर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरणाला मुहूर्त लागला:मंगळवारी होणार पुरस्कार वितरण
हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये पाच वर्षापासून रखडलेल्या जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरणाला मुहूर्त लागला असून मंगळवारी तारीख 24 दुपारी तीन वाजता जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात या पुरस्काराची वितरण होणार आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये 563 ग्रामपंचायतीमधून सुमारे साडेतीनशे पेक्षा अधिक ग्रामसेवक कार्यरत आहेत. एका ग्रामसेवकाला दोन पेक्षा अधिक ग्रामपंचायतच्या कारभार पहावा लागत आहे. शासनाच्या विविध योजनांची गावपातळीवर परिणामकारक अमलबजावणी करण्याचे काम ग्रामसेवकांना करावे लागत आहे. ग्रामसेवकांकडून गाव पातळीवर कामकाज केले जात असतानाही मागील पाच वर्षापासून आदर्श ग्राम पुरस्कार देण्यात आलेच नाहीत. या प्रकारामुळे ग्रामसेवक संघटनांमधून तीव्र असंतोष निर्माण झाला होता. दरम्यान ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे पाटील, सचिव राजेश किलचे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन रखडलेले आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरित करावे अशी मागणी केली होती मात्र प्रत्येक वेळी संघटनेला अधिकाऱ्यांनी आश्वासनच दिले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी आदर्श ग्रामसेवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सन 2018 -19 ते सन 2023 - 24 या कालावधीतील निवडण्यात आलेल्या आदर्श ग्रामसेवकांना पुरस्कार वितरण केले जाणार आहे. येथील जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहामध्ये मंगळवारी ता 24 दुपारी तीन वाजता या पुरस्काराचे. वितरण होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी मागील पाच वर्षात निवडण्यात आलेल्या 21 ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिला जाणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने केले आहे. उशिरा का होईना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण होणार असल्याने ग्रामसेवक संघटनेमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोककुमार एकनाथ खरात उर्फ 'कॅप्टन खरात' याच्या काळ्या कारनाम्यांविरुद्ध नाशिक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अशोक खरातवर आतापर्यंत ६ फौजदारी गुन्हे दाखल झाले असून, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, एसआयटीने आता पीडितांसह जनतेला समोर येण्याचे आणि तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. तसेच माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासनही पोलिसांकडून देण्यात आले आहे. अशोक खरात याच्याविरोधात दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याचे तपासात समोर येत आहे. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते (भा.पो.से.) यांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाची तांत्रिक आणि पुराव्यानिशी चौकशी करत आहे. केवळ ६ गुन्ह्यांपर्यंत मर्यादित न राहता, जर इतर कुणाचीही फसवणूक किंवा छळ झाला असेल, तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे. ओळख गोपनीय राहणार; पोलिसांचे आश्वासन अनेक पीडित व्यक्ती बदनामीच्या भीतीने तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन एसआयटीने स्पष्ट केले आहे की, जे नागरिक किंवा पीडित या गुन्ह्यांसंबंधी माहिती देतील, त्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. आरोपी अशोक खरात याने कोणाविरुद्धही कोणताही अपराध केला असल्यास किंवा त्याबाबतची माहिती उपलब्ध असल्यास ती त्वरित पोलिसांना कळवावी. तक्रारदार किंवा माहिती देणाऱ्यांनी पोलीस उप अधीक्षक किरणकुमार सुर्यवंशी, महिला पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलीस निरीक्षक राहुल मोरे या अधिकाऱ्यांशी किंवा ९५०३२७०२२४ आणि ७७७५८१६३८९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर गुन्हा दरम्यान, अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. पोलिसांनी खरातला अटक केली आहे. तसेच त्याच्या ट्रस्टवरील सदस्या रुपाली चाकणकर यांनाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तपासादरम्यान असे निदर्शनास आले आहे की, काही विकृत मानसिकतेचे लोक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मॉर्फिंग तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांचे बनावट तसेच आक्षेपार्ह फोटो तयार करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणाशी कोणताही संबंध नसलेल्या निरपराध महिलांचे फोटोही चुकीच्या पद्धतीने वापरले जात असून, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. सायबर पोलिसांनी अशा सर्व संशयास्पद पोस्ट्सवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता, सायबर पोलिसांनी विशेष पथकाद्वारे सोशल मीडिया मॉनिटरिंगला प्राधान्य दिले आहे. केवळ पोस्ट तयार करणारेच नव्हे, तर त्या फॉरवर्ड करणारे आणि अशा ग्रुप्सचे ॲडमिनही पोलिसांच्या रडारवर आहेत. तपासात अडथळा निर्माण होईल किंवा प्रकरणाला वेगळे वळण लागेल, अशा कोणत्याही कृत्यावर पोलिस कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
२८ जानेवारी २०२६ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस होता, ज्या दिवशी राज्याचा दैदिप्यमान तारा निखळला. पण आज दोन महिने उलटूनही आपल्या लाडक्या नेत्याच्या मृत्यूचे सत्य समोर का येत नाही? असा आर्त सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांना आज विधानसभेच्या सभागृहात रडू कोसळले. २९३ च्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान तुपे यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावरून सरकार आणि संबंधित 'व्हीएसआर' कंपनीला अक्षरशः धारेवर धरले. जोपर्यंत दादांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. चेतन तुपे म्हणाले, २८ जानेवारी २०२६ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय काळाकुट्ट दिवस. ही तारीख महाराष्ट्रातील १४ कोटी जनता विसरू शकणार नाही. त्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील दैदिप्यमान तारा क्षितीजावरून निखळला. आपल्यातून आपले सर्वांचे आणि महाराष्ट्राचे लाडके अजितदादा आपल्याला सोडून निघून गेले. हे दु:ख राज्यातील १४ कोटी जनतेला आहे. चेतन तुपे म्हणाले, आमच्या राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांच्या आणि महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या मनात काही प्रश्न आहेत. आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले, चौकशीची मागणी केली. सरकार याबद्दल अतिशय समक्षपणे आणि समर्थपणे सगळी चौकशी करतील, अशी आमच्या मनात पूर्ण खात्री आहे. पण महाराष्ट्रातील १४ जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत, त्याला वाचा फुटली पाहिजे. कमी दृश्यमानता असताना लँडिंगचा हट्ट का? चेतन तुपे म्हणाले, हा अपघात का घडला? याबाबत वारंवार आणि अनेक अहवालात सांगितले की, दृष्यमानता कमी होती. मग अत्यंत कमी दृष्यमानता असताना विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न का केला गेला? महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री विमानात बसलेला असताना ते विमान वळवून दुसऱ्या विमानतळाकडे का नेण्यात आले नाही? थोडावेळ थांबवण्यात का आले नाही? हे प्रश्न आमच्यासारख्याला पडलेत. विमान लँडिंग करण्यासाठी व्हीएसआर कंपनीकडून पायलटवर कुणाचा दबाव होता का? असुरक्षित परिस्थिती असताना विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न का केला गेला? हा खरा प्रश्न आहे. याचीही चौकशी झाली पाहिजे. याची उत्तरे मिळाली पाहिजे. याची उत्तरे जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राच्या मनाला शांती लाभणार नाही. विमानात अतिरिक्त इंधन भरले होते का? चेतन तुपे म्हणाले, सांगताना असे सांगण्यात आले की, विमानाचा ॲप्रोज एका दिशेने होता. विमान रनवेपासून विचलित झाले. काही लँडिंग होताना झाडाला धडकले गेले. रनवेच्या डाव्या बाजुला जाऊन ते कोसळले आणि त्यानंतर विमानात आग लागली. मात्र यानिमित्तानेही काही प्रश्न आहेत. विमान मुंबईवरून बारामतीला जात होते, त्यासाठी जेवढे इंधन पाहिजे, तेवढे होते की त्यापेक्षा अतिरिक्त भरले होते. अतिरिक्त इंधन भरले असेल, तर विमान डायव्हर्ट का केले नाही? उतरवायचाच प्रयत्न का केला? विमानात नक्की किती इंधन होते? अतिरिक्त असेल तर ते का होते? अतिरिक्त इंधन असताना सुद्धा लँडिंग तिथेच करायचा हट्ट का केला गेला? पुढच्या एअरपोर्टकडे का नाही गेले? हे सगळे आम्हाला समजले पाहिजे. विमानाच्या उड्डाणाची सुरक्षा तपासणी झाली होती का? चेतन तुपे म्हणाले, विमान मुंबईकडून बारामतीकडे उड्डाण करणार होते, त्यावेळी या विमानाच्या उड्डाणाची सुरक्षा तपासणी झाली होती का? झाली असेल तर व्यवस्थित झाली होती का? ती कोणी केली होती? त्याचा अहवाल कुठे आहे? त्याचे सत्यही समोर आले पाहिजे. हे सगळे आम्हाला समजले पाहिजे. त्या उड्डाणाला पात्र ठरवणारा एअरक्राफ्ट्स मेन्टेनन्स इंजिनिअर कोण होता? त्याचे नाव काय? विमान उड्डाणासाठी योग्य आहे हे ज्या व्यक्तीने क्लिअर केले त्याचे नाव समोर का येत नाही? विमान तेच होते की शेवटच्या क्षणी बदलले? कुठल्या विमानाला क्लिअरन्स दिला होता? कुठल्या विमानाची तपासणी झाली होती? या सगळ्या गोष्टी आमच्या मनात शंका निर्माण करत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचे डिटेल अहवाल समोर आले पाहिजेत आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे. पायलट बदलण्याचे 'ते' संशयास्पद कारण चेतन तुपे म्हणाले, नियोजित विमानेच जे पायलट होते, ते असे कुठल्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकले होते की त्यांना बदलावे लागले? शेवटच्या क्षणी क्रू का बदलला गेला? हा कुणाच्या आदेशाने बदलला गेला? कंपनीच्या कोणत्या माणसाने क्रू बदलण्याचे आदेश दिले? या सगळ्याची शहानिशा झालीच पाहिजे आणि या सगळ्याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. कारण सकाळी सहा वाजता वाहतूक कोंडीत पायलट अडकले आणि त्यामुळे नवीन पायलट आणि क्रू बदलण्यात आला. हेच मुळी संशयास्पद वाटतंय. सकाळी सहा वाजता कुणीही ट्रॅफिकमध्ये अडकत नाही. अडकला जरी, तरी तो एखादा मिनिट सिग्नलला अडकतो. सकाळी सहा वाजता अर्धा अर्धा तास कुणी अडकतो का? सकाळी सहा वाजता कोणते ट्रॅफिक सिग्नल चालू असतात? त्यामुळे अतिशय मोठी संशयाची सूई त्या दिशेने फिरते की, हे पायलट का बदलण्यात आले? याचे उत्तर आम्हाला मिळालेच पाहिजे. माझा कटाक्ष कुणावर नाही, तर व्हीएसआर कंपनीवर आहे. कारण क्रू बदलण्याचा निर्णय कंपनीचा होता. तो का घेण्यात आला? त्यासाठी ट्रॅफिकमध्ये अडकण्याचे संशयास्पद कारण का दिले? हा माझा मुख्य प्रश्न आहे. मेन्टेनन्स इंजिनिअरचे नाव गुलदस्त्यात का? चेतन तुपे म्हणाले, डीएफडीआर आणि सीव्हीआर यांच्या डीकोडिंगबद्दल अद्ययावत माहिती काय आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आली पाहिजे. व्हीएसआर कंपनीची दोन-चार विमाने थांबवली. संपूर्ण विमानांची चौकशी का झाली नाही? कारण अनेक ठिकाणी लक्षात आले की, कंपनीच्या विमानांचे उड्डाणाचे तास भरून गेले होते. पण त्याचा मेन्टेनन्स होत नव्हता. या सगळ्याची चौकशी का झाली नाही? प्रत्येक विमानाची बारकाईने तपासणी का झाली नाही? काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी देखील याच कंपनीचे विमान वापरले होते. त्याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना याच कंपनीचे विमान वापरत होते. मोठ्या व्यक्ती यांच्या विमानातून प्रवास करत असतात, तरी सुद्धा यांच्याकडे मेन्टेनन्समध्ये एवढी दिरंगाई आणि हलगर्जी होत असेल, तर यांच्यावर कारवाया का होत नाहीत? विमानात इंधनाव्यतिरिक्त आणखी कोणता माल भरला होता? चेतन तुपे म्हणाले, विमानात स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात आणि आपण सगळ्यांनीही टीव्ही चॅनलला विमानात अनेक स्फोट झाल्याचे बघितले. मग त्या विमानात इंधनाव्यतिरिक्त इतर अज्ञात असा माल किंवा कार्गो भरला होता का, ज्यामुळे स्फोट झाले? यासंदर्भात कोण आणि कधी खुलासा करणार? जे पायलट वाहतूक कोंडीत अडकले होते, त्यांच्या नार्को टेस्ट करा. महाराष्ट्राच्या जनतेला याचे उत्तर कधी मिळणार? ही चौकशी तडीला लावली पाहिजे. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजे. जोपर्यंत आमच्यासमोर सत्य येत नाही, तोपर्यंत आम्ही कुणी थांबणार नाही.
होर्मुझ : मध्य-पूर्वेतील युद्ध आता समुद्रातही पेटले आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग मानल्या जाणा-या होर्मुजच्या सामुद्रधुनीवर इराणने आपली पकड घट्ट केली असून येथून जाणा-या व्यापारी जहाजांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जात असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. इराणच्या या मनमानी कारभारामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला […] The post होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कच्च्या तेलाचे दर ६० टक्क्यांनी वाढले
नवी दिल्ली : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ लागला आहे. वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा संकट निर्माण झाले असून कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. अवघ्या एका महिन्यात कच्च्या तेलाचे दर सुमारे ६० टक्क्यांनी वाढले आहेत. २८ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाले तेव्हा कच्च्या तेलाची किंमत सुमारे ७० […] The post कच्च्या तेलाचे दर ६० टक्क्यांनी वाढले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विसर्जित करण्याची मागणी केली आहे. 'एपस्टीन फाईल्स' प्रकरणावरून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने संयुक्त मोर्चा आयोजित केला होता. संविधान चौकात झालेल्या सभेत त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना यासंदर्भात जाब विचारला. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटले की, 'एपस्टीन फाईल्स'वरील आंदोलन देशभर पसरल्यास मोदी लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानवर हल्ला करू शकतात. त्यांनी इराणमध्ये अडकलेल्या १७ भारतीय जहाजे आणि ४० हजार लोकांना परत आणण्याचे आव्हानही मोदी सरकारला दिले. आतापर्यंत केवळ दोन जहाजे परत आल्याचे त्यांनी नमूद केले. आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर 'मुद्रा मोदी आता मुजरा मोदी झाले आहेत' अशी टीका केली. मोदी सरसंघचालकांचे ऐकत नसतील तर त्यांना दोन दिवसांत 'कैद करून आणू' असा इशाराही त्यांनी दिला. हर्षवर्धन सपकाळ यांनी 'एपस्टीन फाईल्स'मुळे गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी मोदींना पदावरून हटवणे हा एकमेव उपाय असल्याचे म्हटले. सपकाळ यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचा भाजप आणि केंद्र व महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही प्रभाव राहिला नसल्याचे म्हटले. पंतप्रधान मोदी त्यांचे ऐकत नसून 'सैराट' झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली. प्रकाश आंबेडकर आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा संविधान चौकातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाकडे निघाला होता, परंतु तो मॉरिस कॉलेजजवळ अडवण्यात आला. सपकाळ यांनी अमेरिकेशी सुरू असलेल्या व्यापार करारामुळे देशाच्या आर्थिक हितसंबंधांना धक्का बसल्याचे सांगितले. यामुळे शेतकरी आणि वस्त्रोद्योग क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून, भारत पुन्हा गुलामगिरीकडे जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अमेरिकेतील बाललैंगिक आरोपी जेफ्री एपस्टीनच्या ई-मेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अनेकदा उल्लेख आढळल्याने, यावर सरसंघचालक भागवत यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.
अर्जेंटिनाकडून येणार एलपीजी गॅस
नवी दिल्ली : इराणमधील युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणा-या पुरवठ्यावर थेट परिणाम झाला आहे, तसेच उत्पादनावरही परिणाम झाला आहे. यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये गॅसचा तुटवडा पाहायला मिळत आहे. दरम्यान, भारताला दक्षिण अमेरिकन देश अर्जेंटिनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन महिन्यांत अर्जेंटिनाकडून होणारी आयात दुप्पट झाली असून हा भारतासाठी मोठा दिलासा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जेंटिनाने गेल्या […] The post अर्जेंटिनाकडून येणार एलपीजी गॅस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे महानगरपालिकेने कोविड-१९ महामारीदरम्यान कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण होऊन निधन झालेल्या ११ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे आर्थिक अनुदान वितरित केले. महापौर मंजुपा दीपक नागपुरे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. कोविड-१९ च्या अभूतपूर्व संकटात महानगरपालिकेचे कर्मचारी जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत होते. या काळात अनेक कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने कोविड-१९ प्रतिबंध व उपचार सुरक्षा कवच ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत यापूर्वी ८८ कायम कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे सहाय्य देण्यात आले आहे. मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याच योजनेअंतर्गत ११ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे अनुदान देण्यास मुख्य सभेने मंजुरी दिली होती. त्यानुसार हे वितरण करण्यात आले. महापौर नागपुरे यांनी यावेळी दिवंगत कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेचे कौतुक करताना, त्यांच्या त्यागामुळे शहरातील आरोग्य व अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवणे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर यांनीही कठीण काळात त्वरित आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक केले. कार्यक्रमास उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती सदस्य प्रशांत जगताप, सभासद सचिन दोडके यांच्यासह अधिकारी व दिवंगत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. अनुदान मिळालेल्या वारसांपैकी प्रियंका जाधव आणि चारुशीला सोनवणे यांनी प्रशासनाचे आभार मानले. ही मदत त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाड्याने घेतलेली कार बनावट कागदपत्रांनी विकली:७ लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा दाखल
पुण्यात भाड्याने घेतलेली कार बनावट कागदपत्रांच्या आधारे विकून ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मांजरी पोलिस ठाण्यात चैतन्य विजय वाघमोडे (वय २९, रा. घुलेनगर, मांजरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मयुर लोंढे (रा. भोसरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, ही घटना ८ नोव्हेंबर २०२५ ते १७ मार्च २०२६ दरम्यान घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाघमोडे हे एर्टिगा कार भाड्याने देण्याचा व्यवसाय करतात. त्यांनी आपली कार ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नोंदवली होती. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी आरोपी लोंढे याने त्यांच्याशी संपर्क साधून कार भाड्याने घेतली. त्यावेळी दररोज ३ हजार रुपये भाडे ठरले होते आणि सुरुवातीला आरोपीने ५ हजार रुपये ऑनलाइन पाठवून वाघमोडे यांचा विश्वास संपादन केला. यानंतर ८ नोव्हेंबर रोजी आरोपीने पुन्हा कार भाड्याने घेतली आणि १० हजार रुपये रोख दिले. १२ डिसेंबरपर्यंत त्याने नियमितपणे भाडे दिले, मात्र त्यानंतर त्याने पैसे देणे थांबवले आणि संपर्क तोडला. जीपीएसच्या मदतीने कार तळेगाव राजेवाडी येथे असल्याचे समजले. तिथे आरोपीने पैसे देण्याचे आश्वासन दिले, परंतु ते पूर्ण केले नाही. पुढे ही कार टेंभुर्णी येथे आढळली. तिथे वाघमोडे आणि आरोपी यांच्यात वाद झाला आणि आरोपीने कारमधील जीपीएस यंत्रणा बंद केली. तपासात असे समोर आले की, मयुर लोंढे आणि सागर ढवळे यांनी बनावट नोटरी कागदपत्रे तयार करून ही कार लहु ढवळे याला विकली होती. या बनावट कागदपत्रांमध्ये मूळ मालकाच्या फोटोऐवजी आरोपीचा फोटो लावण्यात आला होता आणि बनावट स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या होत्या. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक उमेश रोकडे करत आहेत.
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सध्या सुरू असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम आशियात निर्माण झालेल्या परिस्थितीवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. लोकसभेत बोलताना पीएम मोदींनी इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील संघर्षाबाबत चिंता व्यक्त केली. तसेच, सर्व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरक्षितपणे भारतात पोहोचत राहील, याची खात्री करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. या युद्धाचा जागतिक […] The post युद्धामुळे भारतापुढे आव्हाने appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे येथे आयोजित 'गौ टेक २०२६' आंतरराष्ट्रीय शिखर परिषद व प्रदर्शनात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गाईच्या आर्थिक क्षमतेवर भर दिला. ते म्हणाले की, गाईमध्ये देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा देण्याची ताकद आहे. गाईपासून अनेक उत्पादने तयार होऊ शकतात, ज्याची सर्वसामान्यांना कल्पना नाही. ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज (GCCI) या आंतरराष्ट्रीय संस्थेने महाराष्ट्र गो सेवा आयोग आणि आर. आर. काबेल यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. पुणे येथील कृषी महाविद्यालय मैदानावर हे 'गौ टेक २०२६' आंतरराष्ट्रीय शिखर परिषद व प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनाला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. जीसीसीआयचे संस्थापक डॉ. वल्लभभाई कथिरिया आणि महाराष्ट्र गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष व 'गौ टेक २०२६' चे आयोजनाध्यक्ष शेखर मुंदडा हे देखील यावेळी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात गाईच्या शेणाचा वापर कसा करावा, हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर असतो. गोबर गॅससारख्या तंत्रज्ञानाने समाजाच्या गरजा पूर्ण करता येतात. सरकारने गोशाळांना अनुदान देण्यास सुरुवात केली असून, गायी आणि तिच्याशी संबंधित उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आयोजक डॉ. वल्लभभाई कथिरिया यांनी सांगितले की, 'गौ टेक' हे केवळ प्रदर्शन नसून, गौ-आधारित अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून भारताला आत्मनिर्भर व संस्कारित बनवण्याचे एक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभियान आहे. या परिषदेत धोरणकर्ते, शास्त्रज्ञ, उद्योगपती, शेतकरी आणि विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. शेखर मुंदडा यांनी माहिती दिली की, प्रदर्शनात सेंद्रिय खत, दुग्ध उत्पादने, गोमूत्र व शेणावर आधारित उत्पादने, नैसर्गिक शेती, पशुवैद्यकीय तंत्रज्ञान, सौर ऊर्जा, चारा उद्योग, शासकीय बँका, गौ सेवा आयोग आणि विविध स्टार्ट-अप्सचे स्टॉल्स आहेत. तसेच, भारतीय देशी गाईंच्या प्रजातींचे थेट प्रदर्शन आणि पंचगव्य आधारित उपचार पद्धतींशी संबंधित माहितीही येथे उपलब्ध आहे.
ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वाहन उद्योग क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हा निर्णय घेतला. यासोबतच सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना आणि वीरमातेलाही सन्मानित करण्यात येणार आहे. पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी ही माहिती दिली. यंदा या पुरस्काराचे ३८ वे वर्ष आहे. गेल्या ३७ वर्षांपासून संस्थेने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात आणि परदेशातही पोहोचवला आहे. पुरस्कारात बालशिवाजींची सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती आणि पुणे नगरीच्या ग्रामदैवतांची प्रतिमा असलेले वैशिष्ट्यपूर्ण स्मृतिचिन्ह दिले जाते. यासोबतच सन्मानित पुणेकरास दोन लाख रुपये रोख रक्कम प्रदान केली जाते. यापूर्वी विविध क्षेत्रातील अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव जगभर पोहोचवणाऱ्या ३७ ज्येष्ठ पुणेकरांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, दिलीपकुमार, आशा भोसले, नारायण मूर्ती, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. शिवकुमार शर्मा यांसारख्या अनेक मान्यवरांचा यात समावेश आहे. या पुरस्कार सोहळ्यात कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या पाच जवानांचाही मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येतो. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर 'दगडूशेठ' गणपती बाप्पाच्या दर्शनाला नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब पटकाविणाऱ्या हर्षवर्धन सदगीर यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत आरती केली. यावेळी त्यांचे गुरु ज्येष्ठ कुस्तीपटू काका पवार हे देखील उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ चव्हाण, राजाभाऊ घोडके, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, श्रीराज रासने, राजाभाऊ पायमोडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हर्षवर्धन सदगीर म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आल्यावर मनाला शांती मिळते. गणपती बाप्पाच्या आशिर्वादामुळे मी महाराष्ट्र केसरी जिंकलो. सन २०१९-२० ला मी महाराष्ट्र केसरी जिंकलो होतो. त्यानंतर माझे गुरु काका पवार यांनी मला पुढची तयारी करण्यास सांगितले आणि लढण्याचे बळ दिले. त्यामुळे पुन्हा कुस्ती करायची हे मिशन ठेवून मी लढलो आणि जिंकलो.
मोठ्या आवाजामुळे तरुणांच्या श्रवणशक्तीवर गंभीर परिणाम
मुंबई : हेडफोन आणि इअरफोनचा वाढता वापर तरुणांच्या श्रवणशक्तीवर दुष्परिणाम करत आहे. वारंवार इअरफोनचा वापर, जास्त वेळ डिजिटल उपकरणांवर घालवणे आणि शहरांमध्ये वाढलेली आवाजाची पातळी यामुळे २० ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये श्रवणविषयक समस्या वाढत आहेत. योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास ही समस्या पुढे जाऊन कायमस्वरूपी श्रवणशक्ती कमी होण्याचे मुख्य कारण ठरू शकते. आजच्या डिजिटल […] The post मोठ्या आवाजामुळे तरुणांच्या श्रवणशक्तीवर गंभीर परिणाम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्राचा एपस्टीन ढोंगी बाबा अशोक खरात याच्या प्रकरणात जादू टोणा विरोधी, अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा अंमल केला पाहिजे. मात्र दुर्देवाने या कायद्याचे नियम आजपर्यंत बनवले गेली नाहीत. या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसेच प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे. याबाबत ते म्हणाले, अशोक खरात याच्या विरोधात जादूटोणा विरोधी, अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा अंमल केला पाहिजे त्या स्वरूपाची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आहे. मात्र दुर्दैवाने २०१३ साली हा कायदा आपण अंमलात आणला मात्र या कायद्याचे नियम आजपर्यंत बनवले गेले नाहीत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करायला लावून सामाजिक न्याय विभाग व अन्य विभागाच्या समन्वयाने हे कायदे कसे अंमलात येतील या संदर्भातील नियम तातडीने तयार करायला घेतले पाहिजेत. राज्यभरातल्या पोलिस स्टेशन मध्ये या कायद्यानुसार अंधश्रद्धा विरोधी कक्ष तयार करण्याची महत्वाची तरतूद आहे. अनेक पोलिस स्टेशनमध्ये आशाप्रकाच्या विभागाची निर्मिती केली आहे. पण कुठल्या नियमानुसार त्याच्यावर कार्यवाही करायची? हे पोलिसांना माहीत नाही. त्यामूळे ज्यावेळी आपण कायदे तयार करतो तेंव्हा त्याचे नियम तयार करायला लागतात. त्याची अंमलबजावणी करावी लागते त्यामूळे हे नियम तातडीने करायला पाहिजेत. महाराष्ट्राने २०१३ मध्ये हा कायदा आणला, मात्र त्यावेळे पासून आजपर्यंत या कायद्याचे नियम तयार केलेले नाहीत. दहा वर्ष जर आपण कायदे बनवून त्याचे नियम बनवत नसू तर त्याच्यापेक्षा लांच्छनास्पद काही होऊ शकत नाही. त्यामूळे अशा भोंदू बाबांचे फावते. कुठल्याही नियमानुसार त्याच्यावर कार्यवाही होत नाही . आणि वेगवेगळे नियम लागू करून त्यावर कारवाई केली जाते, मात्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करता येत नाहीत त्यामूळे याचे नियम तातडीने तयार करावे लागतील असेही माने यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ नाटककार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुरेश खरे यांनी पद्मश्री वसंत कानेटकर यांना गुरुस्थानी मानत, आपण त्यांच्या नाट्यधर्मी कुळातील असल्याचे म्हटले आहे. कानेटकर हे केवळ एक नाव नसून ते नाट्यक्षेत्रातील एक 'स्कूल' असल्याचेही त्यांनी नमूद केले. वसंत कानेटकर यांच्या रौप्यमहोत्सवी स्मृती वर्षाच्या निमित्ताने आयोजित 'वसंत स्मृती' महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नवलमल फिरोदिया सभागृहात हा उद्घाटन सोहळा पार पडला. या महोत्सवात वसंतराव कानेटकर यांच्या साहित्याला आदरांजली वाहण्यात आली. यावेळी व्यासपीठावर महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विजय केंकरे, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, इन्स्पायरर्स ट्राइब प्रकाशवाटा फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष गणेश चाफेकर, सीए (डॉ.) केतन जोगळेकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे कार्यकारी अध्यक्ष भूषण पटवर्धन आणि विदिशा विचार मंचच्या संस्थापक ममता क्षेमकल्याणी उपस्थित होते. सुरेश खरे यांनी कानेटकरांच्या नाटकांचे विश्लेषण करताना सांगितले की, त्यांच्या निवडक १०-१२ नाटकांचा अभ्यास केल्यास पिता-पुत्रांच्या नातेसंबंधांचे त्यांनी केलेले चित्रण अतुलनीय आहे. कानेटकरांच्या नाटकातील पिता-पुत्रांचे नातेसंबंध हा स्वतंत्र पीएचडीचा विषय होऊ शकतो, असेही खरे यांनी नमूद केले. कानेटकरांची लेखणीवर प्रचंड निष्ठा होती. त्यांच्या नाटकांची उजळणी आणि अभिवाचनाचे प्रयोग होणे आवश्यक आहे. कानेटकरांचे संवाद ताकदीचे असले तरी त्यांचे नाटक केवळ संवादात अडकलेले नव्हते. त्यांच्या नाटकांतील पात्रांची योजना आवश्यकतेनुसार आणि चपखलपणे केलेली असे. कानेटकर हे केवळ नाटककार नव्हते, तर त्यांनी नेपथ्य, प्रकाश योजना आणि ध्वनी यांसारख्या तांत्रिक बाबी समजून घेतल्या होत्या. त्यानुसार त्यांनी संहिता लेखन केले, मात्र तंत्र हे नाट्यलेखनावर वरचढ ठरणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. नाट्यलेखन करताना तंत्र आणि नाट्य यांचे उत्तम संतुलन त्यांनी साधले. कानेटकरांच्या नाटकांची विविधता अफाट होती. त्यांनी ऐतिहासिक, चरित्रात्मक, विनोदी आणि संगीत नाटके अशा सर्वच नाट्य प्रकारात सहज मुशाफिरी केली. त्यांच्या नाटकातील भाषा आणि भाषेवरील त्यांचे प्रभुत्व अतुलनीय होते. कानेटकरांकडून होणारे नाट्य अभिवाचन हा एक रोमांचकारी अनुभव असे, असेही सुरेश खरे यांनी सांगितले.
प्रख्यात गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित 'अमृताहूनी गोड' या विशेष संगीत कार्यक्रमाने पुणेकर रसिकांना सुरेल पर्वणी अनुभवता आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने गणपती मंदिराच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सवात हा कार्यक्रम सादर करण्यात आला. गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या या महोत्सवात नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माणिक वर्मा फाऊंडेशनच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने महोत्सवात विशेष रंगत आणली. राणी वर्मा, वंदना गुप्ते, भारती आचरेकर, शैला दातार, सावनी दातार, नीलाक्षी पेंढारकर, दीपिका जोग, ह्र्दया दातार आणि अस्मिता पांडे यांनी या सादरीकरणात सहभाग घेतला. या मैफलीत 'या राधेला अडवू नको', 'खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी', 'जाळीमंदी पिकली करवंद', 'घननीळा लडीवाळा', 'दर्शन दे राधेला', 'हसले मनी चांदणे' अशी एकापेक्षा एक सरस गीते सादर करत कलाकारांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात माणिक वर्मा यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या संगीत प्रवासाचे भावपूर्ण चित्रण करण्यात आले. सावनी दातार यांनी 'सनातन नाद हा साधुजना पहावे...' आणि 'तुझ्या मनात कुणीतरी लपला ग...' या गीतांच्या सादरीकरणाने वातावरण भारावले. पंडित श्रीनिवास खळे यांच्या 'एकतारी गाते गाते गीत विठ्ठलाचे' या रचनेचे प्रभावी सादरीकरण झाले, तर किशोरी आमोणकर यांच्या 'पीड पराई' या गाजलेल्या बंदिशीच्या सादरीकरणाने रसिकांची दाद मिळवली. दीपिका जोग यांनी 'क्षणभर उघड नयन देवा' आणि 'विठ्ठला आळवीते मी तुला' ही भक्तीगीते सादर केली. अभिनेत्री भारती आचरेकर यांनी 'त्या सावळ्या तनूचे' हे गीत सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता माणिक वर्मा यांनी अजरामर केलेल्या 'सावळाच रंग तुझा' या गीताने झाली.
डबल महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीरने आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. टीकाकारांकडे दुर्लक्ष करून आपले लक्ष केवळ कामगिरीवर केंद्रित ठेवणार असल्याचे त्याने सांगितले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात तो बोलत होता. सदगीरने सांगितले की, कुस्तीमध्ये यश मिळवण्यासाठी त्याला तब्बल १८ वर्षे कठोर परिश्रम करावे लागले. २०२० मध्ये पहिली महाराष्ट्र केसरी गदा जिंकल्यानंतर लॉकडाऊन आणि शस्त्रक्रियेमुळे त्याच्या कारकिर्दीत अडथळे आले. दोन वर्षे अपेक्षित यश मिळाले नाही, मात्र जिद्द आणि सातत्याच्या बळावर त्याने पुनरागमन करत पुन्हा किताब पटकावला. आजोबांच्या प्रेरणेमुळेच कुस्तीची आवड निर्माण झाल्याचेही त्याने नमूद केले. सोशल मीडियावरील टीकेबाबत बोलताना सदगीर म्हणाला की, बहुतांश लोकांना कुस्तीतील डावपेच समजत नाहीत, त्यामुळे अशा टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही. पुढील काळात स्वतःची व्यायामशाळा सुरू करण्याचे त्याचे स्वप्न आहे. सध्या त्याचे संपूर्ण लक्ष हिंद केसरी आणि राष्ट्रकुल स्पर्धांमधील पदकावर आहे. दरम्यान, नाशिक महानगरपालिकेत क्रीडा अधिकारी पदाची त्याची अपेक्षा पूर्ण झाली नसली तरी, सरकारकडून संधी मिळाल्यास नोकरी स्वीकारण्याची तयारी त्याने दर्शवली. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते ज्येष्ठ प्रशिक्षक काका पवार यांनी कुस्तीपटूंना संयमाचा सल्ला दिला. आक्रमकतेपेक्षा मेहनत, शिस्त आणि योग्य दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुस्तीतील राजकारणामुळे खेळाडूंचे नुकसान होत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी महाराष्ट्राने हरियाणाच्या तोडीस तोड प्रगती करण्यासाठी मॅटवरील सराव वाढवण्याची गरज अधोरेखित केली. तसेच सरकारने कुस्तीपटूंना घडवण्यासाठी ठोस धोरण आखावे, अशी मागणीही त्यांनी केली.
महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा
पूर्णा : तालुक्यातील गौर व सर्कलमध्ये मागील काही दिवसांपासून विजेच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महावितरण प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. या मागण्यांकडे त्वरीत लक्ष न दिल्यास महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात गौर सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या कोमल पारवे यांनी पूर्णा महावितरण उपविभाग उपकार्यकारी […] The post महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्याचा अर्थसंकल्प विकसीत भारताकडे नेणारा
परभणी : राज्याचा अर्थसंकल्प २०४७ विकसीत भारत स्वप्नपुर्तीकडे नेणारा आहे. या विकासात महाराष्ट्राचा मोठा वाटा असणार आहे. या अर्थसंकल्पात समता, सामाजिक समरसता ठेऊन धोरणांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २३ हजार किमीची कामे पूर्ण केली जाणार आहेत. विशेषत: नवी मुंबईत एज्युसिटी स्थापन करण्यात येणार असून या ठिकाणी ६ देशांचे विद्यापीठ सुरू होत असून […] The post राज्याचा अर्थसंकल्प विकसीत भारताकडे नेणारा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उपराजधानी नागपूरमध्ये आज राजकीय वातावरण चांगलेच तापले. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांनी संयुक्तपणे काढलेल्या विशाल 'जनआक्रोश मोर्चा'ने आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयावर धडक दिली. जागतिक स्तरावर गाजत असलेल्या 'एपस्टीन फाईल्स'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव आल्याचा खळबळजनक दावा करत, आंदोलकांनी केंद्र सरकार आणि संघाच्या विचारसरणीविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. देशाला एपस्टीन फाईलवाला पंतप्रधान नको, अशा घोषणांनी रेशीमबाग परिसर दणाणून गेला होता. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा सकाळी नागपूरच्या मुख्य भागातून सुरू झाला. कार्यकर्त्यांच्या हातात केंद्र सरकार आणि संघाचा निषेध करणारे बॅनर्स होते. मोर्चा संघ मुख्यालयाच्या दिशेने सरकत असताना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. देशाला 'एपस्टीन फाईल'वाला पंतप्रधान नको, अशा आक्रमक घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्या. देशाला गुलाम बनवण्याचे प्रयत्न सुरू मोर्चाला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आज अमेरिका सार्वजनिक क्षेत्राच्या खाजगीकरणाची मागणी करत आहे आणि नरेंद्र मोदींनी या दिशेने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने परदेशात निर्यात होणाऱ्या भारतीय उत्पादनांवर १८% आयात शुल्क लादले आहे. याचा अर्थ भारतीय उत्पादने अधिक महाग होतील आणि जिथे वस्तू स्वस्त दरात उपलब्ध असतील, तिथून देश त्या खरेदी करतील. परकीय चलन मिळवण्याची संधी कमी केली जात आहे. देशाला गुलाम बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोदींना ब्लॅकमेल केले जात आहे एपस्टाईन फाईलचे फक्त एकच पान उघडण्यात आले आहे. त्यातून हे उघड झाले आहे की, नरेंद्र मोदींनी इतर देशांच्या प्रमुखांसमोर मुजरा केला आहे. मुद्रा मोदी आता मुजरा मोदी बनले आहेत. एपस्टाईन फाईलमध्ये याहूनही बरेच काही आहे. जगभरातील देशांकडे मोदींची सर्व माहिती आहे. हे देश मोदींना धमक्या देत आहेत की, त्यांनी करारावर सही केलीच पाहिजे, नाहीतर त्यांची गुपिते उघड केली जातील. याच कारणामुळे मोदी निमुटपणे करारावर सही करत आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. संघाच्या 'देशभक्ती'वर आंबेडकरांचे प्रश्नचिन्ह मला आरएसएस आणि मोहन भागवत यांना विचारायचे आहे, राष्ट्राचे हित विकणे ही नरेंद्र मोदींची देशभक्ती आहे का? देशाला आर्थिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या पूर्णपणे गुलाम बनवणे ही तुमची देशभक्ती आहे का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. मोदीसारख्या पंतप्रधानाला खाली खेचल पाहिजे या मोर्चामध्ये बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. मोदीसारख्या पंतप्रधानाला खाली खेचल पाहिजे, असा विचित्र - विकृत असणाऱ्या माणसाला देशाचा पंतप्रधान म्हणायची आम्हाला लाज वाटते, असे ते म्हणालेत.
मुंबई शहर जिल्ह्यातील मिळकतीच्या फेरफार प्रक्रियेला आता डिजिटल गती मिळाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतील सुमारे ३० लाख नागरिकांना याचा लाभ होणार आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत विधानसभेत निवेदन करताना सांगितले. मुंबईत प्रथमच मिळकतीचे फेरफार ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, मुंबई शहर व उर्वरित महाराष्ट्रातील प्रॉपर्टी कार्ड संगणकीकरणाच्या प्रणाली वेगवेगळ्या असल्यामुळे आतापर्यंत मुंबईत ऑनलाईन फेरफार प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने या प्रक्रियेला गती दिली आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील १९ महसूल विभाग व ४ नगर रचना योजनांमधील सुमारे २७,८४७ मिळकती पत्रिका https://mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी विशेष ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून पोर्टलद्वारे नागरिकांना घरबसल्या फेरफारसाठी अर्ज करता येणार आहेत. अर्जाची स्थितीही ऑनलाईन तपासता येणार असल्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, मुंबई शहर जिल्ह्यात प्रथमच तब्बल ४५ प्रकारच्या फेरफारांसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये खरेदीखत, वारसा, बक्षीसपत्र, भाडेपट्टा, गहाणखत, रोड सेटबॅक, आरक्षण आणि भूसंपादन अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी विकसित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ मुंबईतील सुमारे ३० लाख नागरिकांना होणार असल्याचे सांगून मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे हा उपक्रम राबविल्याबद्दल मंत्री बावनकुळे यांनी अभिनंदन केले.
मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात दरोडा टाकून पोलिसांना आव्हान देणाऱ्या टोळीतील पाच जणांना हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून एका विधी संघर्षग्रस्त बालकाची चौकशी केली जात आहे. २०० सीसीटीव्ही फुटेज अन तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी कोल्हापूर भागातून त्यांना अटक केली आहे. हिंगोली तालुक्यातील नांदूरा येेथील संदीप तनपुरे यांना जवळा खांबाळा शिवारात एका काळ्या स्कार्पिओ वाहनातून आलेल्या दरोडेखारांनी ता. १३ मार्च रोजी रात्री १० वाजता अडवून त्यांच्याकडील ४२ हजार रुपये रोख पळविले होते. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी गुन्हे शाखेचा तपासाचे आदेश दिले होते. त्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे विशेष पथक नियुक्त केले होते. यामध्ये उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, माधव जिव्हारे, दिलीप मोरे, जमादार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, शिवाजी जालमिरे यांची पथके मराठवाड्यासह विदर्भात रवाना केली होती. पोलीस पथकाने सुमारे २०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज पाहून माहिती घेतली असता सदर गुन्हा करणारी कुख्यात टोळी असून टोळी प्रमुख मुख्य गुन्हेगार हा सौरभ विलास शिंदे (रा. फुलगाव जि. पुणे) असल्याचे स्पष्ट झाले. सर्वजण कोल्हापूर भागात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी रविवारी ता. २२ त्यांना कोल्हापुर जिल्हयातून सौरभ शिंदे (रा. फुलगाव), शुभम तापकीर (रा.भिमाकोरेगाव), गजानन मैदकर (रा. पेरनेगाव जि.पुणे), अभिजित बंडु गदळे (रा. वाघोली जि. पुणे) यांना अटक केली तर एक विधी संघर्षग्रस्त बालकाची चौकशी केली. अधिक चौकशीत त्यांनी गुुुन्हयाची कबुली देऊन वाशिम जिल्हयात ट्रक चालकाला अडवुन दरोडा टाकल्याचे सांगीतले. तसचे सदर गुन्हयासंदर्भाने टिप देणारा आरोपी गजानन गोविंदा गोरे (रा. सोनखास जि. वाशिम) याला पोलिसांनी अटक केली आहे. सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांच्यावर पुणे व परिसरातील मालाविरुध्दचे १६ गुन्हे दाखल आहेत. तसेच हिंगोली जिल्हयात सन २०१७ मध्ये दरोडा टाकल्या संदर्भाने सुध्दा गुन्हा दाखल आहे. सदरचे गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार असुन पुणे जिल्हयातुन हद्दपार असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीकडुन चोरी गेलेली रोख रक्कम २६,०००/-रु व गुन्हयात वापरलेली स्कार्पिओ जिप व मोबाईल असा एकुण १६,००,०००/-रु (सोळा लाख रुपये) चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
राणीबागेत ‘ग्रे’ पोपटांनी विदेशी पर्यटकांना केले आकर्षित!
मुंबई : प्रतिनिधी भायखळा येथे असलेले वीरमाता जिजाबाई भोसले पार्क आणि प्राणीसंग्रहालय (राणी बाग) हे मुंबई आणि परदेशातील पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण बनत आहे. गेल्या दोन वर्षांत, ७१.८ लाख पर्यटकांनी बिबट्या, बंगाल वाघ, मगर आणि अस्वल यांसारख्या देशी आणि विदेशी प्राणी व पक्षी पाहण्याचा थरार अनुभवला आहे. जपानी क्रौंच आणि आफ्रिकन ग्रे पोपटांच्या किलबिलाटाने देशी […] The post राणीबागेत ‘ग्रे’ पोपटांनी विदेशी पर्यटकांना केले आकर्षित! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकमधील गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता पोलिस प्रशासनाने सोशल मीडियावरील 'डिजिटल' गुन्हेगारीविरुद्ध मोठे पाऊल उचलले आहे. या प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ आणि आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणाऱ्यांविरोधात नाशिक सायबर पोलिसांनी कडक पवित्रा घेतला आहे. पीडितांची बदनामी करणाऱ्या आणि त्यांची ओळख उघड करणाऱ्या समाजकंटकांवर थेट गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. पोलिसांनी खरातला अटक केली आहे. तसेच त्याच्या ट्रस्टवरील सदस्या रुपाली चाकणकर यांनाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तपासादरम्यान असे निदर्शनास आले आहे की, काही विकृत मानसिकतेचे लोक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मॉर्फिंग तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांचे बनावट तसेच आक्षेपार्ह फोटो तयार करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणाशी कोणताही संबंध नसलेल्या निरपराध महिलांचे फोटोही चुकीच्या पद्धतीने वापरले जात असून, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. सायबर पोलिसांनी अशा सर्व संशयास्पद पोस्ट्सवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. पीडितेची ओळख उघड करणे कायदेशीर गुन्हा कायद्यानुसार कोणत्याही लैंगिक अत्याचारातील पीडित महिलेची किंवा तक्रारदाराची ओळख सार्वजनिक करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. तरीही व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अफवा आणि दिशाभूल करणारी माहिती वेगाने पसरवली जात आहे. पीडितांच्या सन्मानाचे रक्षण करणे ही आमची प्राथमिकता आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती शेअर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस यंत्रणेने दिला आहे. सायबर पोलिसांचे 'स्पेशल मॉनिटरिंग' प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता, सायबर पोलिसांनी विशेष पथकाद्वारे सोशल मीडिया मॉनिटरिंगला प्राधान्य दिले आहे. केवळ पोस्ट तयार करणारेच नव्हे, तर त्या फॉरवर्ड करणारे आणि अशा ग्रुप्सचे ॲडमिनही पोलिसांच्या रडारवर आहेत. तपासात अडथळा निर्माण होईल किंवा प्रकरणाला वेगळे वळण लागेल, अशा कोणत्याही कृत्यावर पोलिस कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. नागरिकांसाठी पोलिसांचे आवाहन कोणतीही खात्री नसलेली माहिती किंवा फोटो फॉरवर्ड करण्यापूर्वी विचार करा. पीडित महिलांची ओळख पटेल असा कोणताही मजकूर शेअर करणे टाळा. सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्सवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहितीचा आधार घ्या. सोशल मीडियावर आपली बदनामी होत असल्यास तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सरकारी शाळा बंद करण्याचा AISF तर्फे निषेध:पालकमंत्री पंकज भोयर यांना काळे झेंडे दाखवत अडवला ताफा
राज्यातील १८ हजार सरकारी शाळा बंद करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट राज्य सरकारने घातला असल्याचा आरोप करत ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने रविवारी जनता दरबारासाठी तुमसर दौऱ्यावर असताना पालकमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून पापा अडवला व जोरदार नारेबाजी करीत निषेध नोंदवला. तुमसर येथील जुना बस स्थानक परिसरात आंदोलकांनी पालकमंत्र्यांची गाडी अडवून गाडीवर पत्रक फेकले व आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. महसूल कार्यालयातील नियोजित जनता दरबारासाठी जात असलेल्या पालकमंत्री मंत्री डॉ. पंकज भोयर यांचा ताफा अडवण्यासाठी एआयएसएफचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. विशेष म्हणजे सदर आंदोलन शहीद दिनाच्या एक दिवसाआधी झाले असून भगतसिंग यांनी सेंट्रल असेम्ब्ली मध्ये ज्या पद्धतीने आवाज करणारे बॉम्ब टाकत पत्रक फेकले होते. त्याची पुनरावृत्ती तुमसर शहरामध्ये झाली. यामुळे सदर आंदोलनाला अधिक महत्त्व प्राप्त होऊन याची चर्चा राज्यभर होत आहे. आंदोलन तीव्र होत असल्याचे पाहून पोलिसांनी एआयएसएफचे राज्याध्यक्ष वैभव चौपकर यांच्यासह आंदोलक महाविद्यालयीन तरुण-तरुणींना तातडीने ताब्यात घेतले. भाजप सरकार खाजगीकरणाला खतपाणी घालून सर्वसामान्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेत असल्याचा आरोप यावेळी वैभव चोपकर यांनी केला. दरम्यान, पालकमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार नसल्याचे आश्वासन दिले असतानाही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे “पालकमंत्र्यांपेक्षा पोलीस प्रशासन मोठे आहे का?” असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. बाईट: राज्यातील शाळा बंदी व विक्री चा निर्णय सरकारने तात्काळ मागे घेतला नाही, तर राज्यातील 36 ही जिल्ह्यांमध्ये सरकारमधील प्रत्येक मंत्र्याला एआयएसएफ च्या कार्यकर्त्यांकडून ठीक-ठिकाणी काळे झेंडे दाखवीत ताफे अडविण्यात येतील. तेव्हा या घटनेचा बोध घेत सरकारने तात्काळ आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात.... वैभव चोपकर, राज्याध्यक्ष AISF महाराष्ट्र

32 C