नागपूर: काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादात दिल्लीमध्ये तोडगा निघाल्याचा चित्र दिसत आहे. मंगळवारी रात्री झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला झुकते माप देत महापौर पद त्यांच्या गटाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. विजय वडेट्टीवार गटाने आपली ताकद दाखवण्यासाठी 19 नगरसेवक दिल्लीत हजर केले होते. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांना केवळ उपमहापौर पद देण्याचे सांगत माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांना धक्का दिला आहे. यासोबतच, प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार सुरेंद्र अडबाले हेच महापालिकेत काँग्रेसचे गटनेते असतील, यावरही दिल्लीतून शिक्कामोर्तब करण्यात आले.सोमवारी नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात विजय वडेट्टीवार यांच्या गटाच्या नगरसेवकांनी फिल्मी स्टाईलमध्ये एन्ट्री केली होती. दोन बसेसमधून हे नगरसेवक आले होते. त्यांच्यासोबत कित्येक चारचाकी गाड्याही आल्या होत्या. या सगळ्यात ताफ्यातून 19 नगरसेवक नागपूरच्या विभागीय कार्यालयात स्वतंत्र गट नोंदणीसाठी आले होते. सचिन कत्याल यांनी गटनेता म्हणून विभागीय आयुक्तांना नोंदणीसाठी पत्र दिले होते. इतकं सगळं केल्यानंतर नागपूर विभागीय आयुक्तांनी वडेट्टीवार गटाच्या स्वतंत्र गट नोंदणीच्या प्रस्तावाला कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे नाकारले.विभागीय आयुक्तांनी वडेट्टीवारांच्या नगरसेवकांची गटनोंदणी नाकारलीविभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सचिन कत्याल यांना दिलेल्या पत्रात सांगितले की, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्यता अनर्हता अधिनियम 1986 नुसार एकाच पक्षाचे दोन स्वतंत्र गट नोंदवता येत नाहीत. या प्रस्तावात 17 नगरसेवक हजर होते, तर काँग्रेसचे एकूण 27 सदस्य निवडून आले आहेत. याशिवाय 4 नगरसेवकांनी दोन्ही गटांच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यामुळे स्पष्टतेचा अभाव असल्याचे ताशेरे ओढत आयुक्तांनी 6 तांत्रिक त्रुटी काढल्या आहेत. आता काँग्रेसच्या सर्व 27 सदस्यांनी एकत्रितपणे नोंदणी प्रस्ताव सादर करणे अपेक्षित आहे.दरम्यान, चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर बसणार का ? या प्रश्नाचे उत्तर खुद्द काँग्रेसमधली लोकंही ठामपणे देऊ शकत नाहीत. काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला स्थायी समिती अध्यक्षपद दिले आहे. मात्र हा प्रस्ताव त्यांना मान्य आहे की नाही हे अद्याप जाहीर झालेले नाही.
Archana puran singh : अभिनेत्री अर्चना पूरण सिंह एक उत्तम अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाने ती प्रेक्षकांचे मनोरंजन करते. याशिवाय अर्चनाचा स्वत:चा एक युट्यूब चॅनेल आहे. ती अनेकदा त्यावर वेगवेगळे व्लॉग शेअर करत असते. त्यामाध्यमातून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींवर ती भाष्य करताना दिसते. नुकतेच तिने तिच्या कठीण काळातील एक प्रसंग सांगितला आहे. लेटेस्ट व्हिडीओमधून अर्चनाने […]
Sanjay Raut : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत राजकारण तापले असून संजय राऊत यांनी पटेलांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.
ऑनलाईन गेम खेळणाऱ्या तीन अल्पवयीन बहिणींची धक्कादायक कृती
गाझियाबाद : ऑनलाईन गेम खेळणाऱ्या तीन अल्पवयीन बहिणींनी एक धक्कादायक कृती केली. या तीन अल्पवयीन बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारली. या धक्कादायक घटनेत तिघींचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये टिला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी परिसरात ही घटना घडली आहे.घरच्यांनी तिघींच्या सतत ऑनलाईन गेम खेळण्यावर आक्षेप घेतला. यामुळे निराश झालेल्या तीन अल्पवयीन बहिणींनी टोकाचा निर्णय घेतला. मृत मुलींचे वय अनुक्रमे बारा, चौदा आणि सोळा होते.टोकाचा निर्णय घेणाऱ्या मुली टिला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी परिसरातल्या भारत सिटीमध्ये वास्तव्यास होत्या. मुलींनी एकदम टोक गाठल्याचे बघून पोलीस पण चक्रावले आहेत. या धक्कादायक घटनेचा पोलीस तपास सुरू आहे. मुलींनी टोकाचा निर्णय घेण्यामागे फक्त ऑनलाईन गेम खेळण्यावर घेतलेला आक्षेप एवढेच कारण आहे की अन्य काही बाब आहे याचाही तपास पोलीस करत आहेत. सर्व शक्यतांचा विचार करून तपास केला जाईल आणि दोषींविरोधात कायदेशीर कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले.मुलींनी बुधवार ४ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारली. याआधी नेमके काय घडले याचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मुली ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याचा कोरियन लव्हर हा गेम खेळत होत्या.प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार तिघी बहिणी बाल्कनीत आल्या. आधी एकीने उडी मारली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर दोघींचाही मृत्यू झाला. तिघीजणी नवव्या मजल्यावरुन एकदम खाली जमिनीवर कोसळल्या. काय घडले आहे याची जाणीव होताच प्रत्यक्षदर्शीने मदत मागवली. पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला फोन करून बोलावण्यात आले. मुलींनी उडी मारण्याआधी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. या चिठ्ठीत वडिलांची माफी मागत एका डायरीचा उल्लेख करण्यात आला आहे. डायरीत सर्व सत्य कथन केल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. यामुळे पोलिसांनी डायरी ताब्यात घेतल्याचे समजते.मुलींच्या वडिलांनी दोन वेळा लग्न केले होते. पहिल्या पत्नीपासून बराच काळ मूल झाले नाही म्हणून तिच्याच सख्ख्या बहिणीशी त्यांनी लग्न केले होते. यामुळे कौटुंबिक पातळीवर नेमके काय घडले याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.
भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये
अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षाबारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर होत असताना, ५८ वर्षात संसदेत माझी गैरहजेरी कधीही राहिलेली नाही. मात्र, दुर्दैवाने अजित पवार यांचा अपघात झाल्याने मी दिल्लीला जाऊ शकलो नाही. त्यामुळे मला सभागृहात जाऊन अंदाजपत्रक ऐकता आले नाही. पण मी जे काही वाचलं त्यावरुन दोन-तीन गोष्टी लक्षात येतात. अर्थसंकल्पात सामान्य माणसाला यातना होतील, असा नवा कोणताही कर लादण्यात आलेला नाही, ही एक समाधानाची गोष्ट आहे. अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा होती, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बोलताना म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबतही भाष्य केले. अमेरिकेने भारताकडून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील करामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. पण मला एक-दोन गोष्टींची चिंता वाटते. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचे चित्र आणखी एक दोन दिवसांत स्पष्ट होईल. यानंतर सविस्तर भाष्य करणं योग्य ठरेल. पण आता जे लोकांच्या समोर जे काही जाहीर करण्यात आलं आहे, त्यावरुन अमेरिकेला आता कृषी क्षेत्रात भारतात निर्यात करता येईल, अशी तरतूद या करारात आहे. ही गोष्ट भारतीय शेतकऱ्यांच्यादृष्टीने काळजी करण्यासारखी आहे. अमेरिका हा एक शक्तिशाली देश आहे. त्यांची आर्थिक ताकद जास्त आहे. त्यामुळे त्यांनी एखाद्या महत्त्वाच्या वस्तूचे उत्पादन अन्य देशांमध्ये निर्यात करायला सुरुवात केली तर त्याचा विपरीत परिणाम त्या देशाच्या संबंधित भागावर होतो. भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये, ही माझ्यासारख्यांची अपेक्षा आहे, असे शरद पवार यांनी बोलताना सांगितले आहे.अजित पवार यांचे स्मारक उभारण्याबाबत शरद पवार म्हणाले की, पेपरमध्ये वाचलं की आम्ही स्मारक उभारणार आहोत, पण ही गोष्ट मला माहिती नाही. त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. मला ते ठावूक असलं पाहिजे, मात्र मी याबद्दलची नुसती चर्चा ऐकली आहे. याबद्दल काय करायचं याबद्दल एकत्र बसून चर्चा करू, असे आदरणीय शरद पवार साहेब म्हणाले.राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणाच्या मुद्यावर शरद पवार म्हणाले की, या सर्व चर्चेत फडणवीस कुठेच नव्हेत, त्यामुळे त्यांना याबाबत भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही. सध्या चर्चाच झाली नसताना त्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही. माझा उल्लेख का केला हे समजलं नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की,परस्परांना धीर देणं आणि पुढे कसं जायचं याकडे आमचे लक्ष आहे. राजकीय निर्णयाबद्दल आम्ही कोणाशीही अधिकृतरित्या चर्चा केलेली नाही, शपथविधी झाला, संधी दिली आनंद आहे असे शरद पवार यांनी बोलताना सांगितले.यावर सविस्तर बोलताना शरद पवार म्हणाले की ,ऑथेंटिक माहिती मिळत नाही तोपर्यंत मी अपघातासंदर्भात उगीचच शंका घेणार नाही. असे शरद पवार यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.
Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा बॅालीवूडमध्ये कमबॅक करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Korean Lover Game: दिल्ली-एनसीआरला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये काल रात्री उशिरा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टास्क-बेस्ड ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळे तीन बहिणींचा मृत्यू झाला.
Anil Kapoor Look : अनिल कपूर यांचा ‘झक्कास’लुक; रितेश देशमुख कमेंट करत म्हणाला…
Anil Kapoor Look : अनिल कपूर यांच्या लुकवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव
Yami Gautam: रणवीर सिंगसोबत यामी गौतमची ‘धुरंधर 2’मध्ये दमदार एन्ट्री, अॅक्शनने भरलेली खास भूमिका
Yami Gautam: दिग्दर्शक आदित्य धर यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘धुरंधर’ बॉक्स ऑफिसनंतर ओटीटीवरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता या चित्रपटाच्या पुढील भागाची, म्हणजेच ‘धुरंधर 2’ ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. यामी गौतम या चित्रपटात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.
Lust Stoires 3 : लस्ट स्टोरीज पुन्हा भेटीला! तिसऱ्या सीझनची घोषणा; पाहा Video
Lust Stoires 3 : या वेबसिरीजच्या तिसऱ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे.
दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने उत्तर भारतातील मैदानी भागात थंड वारे वाहत आहे. हवामान खात्याच्या मते, बुधवारी (४ फेब्रुवारी २०२६) दिल्लीत थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे, दाट धुके पडण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री उशिरा थंडी अधिक तीव्रतेने जाणवेल.हवामान खात्याने म्हटले आहे की, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि बिहारसह उत्तर भारतातील बहुतेक भागांवर थंडीच्या लाटा येतील. धुक्यामुळे अनेक भागात दृश्यमानता कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यतामंगळवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये दिवस आणि रात्रीच्या तापमानात किंचित वाढ झाली. श्रीनगरमध्ये किमान तापमान २.८ अंश सेल्सिअस होते, तर गुलमर्ग स्की रिसॉर्टमध्ये पारा उणे ५.३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. हवामान विभागाच्या मते, सध्या कमकुवत पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे, ज्यामुळे अनेक भागात ढगाळ आकाश येऊ शकते. उंचावरील भागात पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे.हरियाणा आणि पंजाबमध्ये पावसाचा इशाराहवामान खात्याने हरियाणा आणि पंजाबच्या बहुतेक भागांसाठी हवामानाचा इशारा जारी केला आहे, ज्यामध्ये ढगाळ आकाश आणि जोरदार वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या ३६ तासांत पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपीट झाली आहे, ज्यामुळे थंडी आणखी वाढली आहे. पुढील काही तासांत जालंधर, कपूरथला, पठाणकोट, गुरुदासपूर, अमृतसर, होशियारपूर, नवांशहर, रूपनगर आणि मोहाली येथे पावसाची शक्यता आहे. येथील किमान तापमान ५ ते ६ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये धुक्याचा कहरआग्रा आणि मुरादाबाद विभागांसह उत्तर प्रदेशातील अंदाजे २५ जिल्ह्यांना पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य उत्तर प्रदेशात मेघगर्जनेसह हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आहे. दरम्यान, बिहारमध्ये थंडीचा प्रभाव कायम आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुके पसरले आहे. हवामान खात्याने लोकांना थंडी आणि धुक्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
Pune Mumbai Expressway : गेल्या १५ तासांपासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी
Election Safety Concerns: आगामी राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी बांगलादेशातील सुरक्षा परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक आणि चिंताजनक बनली आहे.
Baramati News : युरोपमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेसाठी डॉ. सागर आटोळे यांची निवड
Baramati News : डॉ. आटोळे यांची निवड ही संस्थेसाठी तसेच संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
भारतात तोंडाचा कर्करोग म्हणजे मुख कर्करोग हा दुर्मीळ आजार नाही, कारण देशातील कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी जवळ-जवळ एक तृतीयांश प्रकरणे या प्रकारात मोडतात; आरोग्याच्या दृष्टीने ही एक मूकपणे बळावणारी आणीबाणीची परिस्थिती आहे, जी स्पष्टपणे दिसत असूनही दुर्लक्षित राहून जाते. तपासणीदरम्यान नुसते पाहूनही सहज लक्षात येण्याजोगा आजार असूनही मूक कर्करोगाच्या जवळ-जवळ ७०-८० टक्के प्रकरणांचे निदान तो गंभीर टप्प्यावर (तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यावर) पोहोचल्यावरच होतो, जेव्हा पाच वर्षांच्या पुढे जगण्याच्या शक्यतेचा दर ३० टक्क्यांच्याही खाली येतो. सुरुवातीच्या टप्प्यावर निदान झालेल्या प्रकरणांमध्ये याच्याबरोबर उलट घडताना दिसते, जिथे आजारातून बचावण्याचे प्रमाण ८० टक्क्यांच्याही पुढे जाते. या आजाराच्या शोकांतिकेचे कारण उशिरा होणाऱ्या निदानामध्ये दडलेले आहे. रुग्णाला पहिली लक्षणे दिसू लागल्यावर तो कर्करोगावर उपचार करणाऱ्या विशेषीकृत केंद्रावर पोहोचण्यामध्ये सर्वसाधारणपणे तीन ते सहा महिन्यांचा काळ जातो. सुरुवातीच्या काळात तोंडाच्या आत उमटणारे व्रण हे बहुतेकदा वेदनारहित आणि आकाराने लहान असतात, तसेच त्यांच्याकडे सहजपणे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे एक सहज बरा होऊ शकण्याजोगा आजार तपासणीअभावी पुढच्या टप्प्यावर पोहोचतो.हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख, सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. सुलतान ए. प्रधान म्हणाले, “स्क्रिनिंग प्रोग्राम्स या आजाराची बाजी पलटवून टाकणारे सिद्ध झाले आहेत. तोंडाच्या तपासणीसाठीच्या सुसंघटित उपक्रमांमुळे कर्करोगपूर्व स्थितींचे लवकर निदान झाल्याने मृत्यूदर २४-३० टक्क्यांपर्यंत घटू शकतो. महाराष्ट्रामध्ये फिरती तपासणी केंद्रे आणि सामुदायिक कर्करोग शिबिरे यातून अतिधोकादायक गटात मोडणारे व्रण मुख कर्करोगात रूपांतरित होण्याआधीच ओळखले जात असल्याचा प्रभाव याआधीच दिसून आला आहे.”आपल्या देशात कर्करोगाची ९० टक्क्यांहून अधिक प्रकरणे तंबाखूसेवानाशी, विशेषत: गुटखा, खैनी आणि सुपारीसारख्या धूरविरहित तंबाखूशी जोडलेली आहेत. मद्यपानामुळे यातील धोका अनेक पटींनी वाढतो, तर मानवी पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) हे तुलनेने अधिक तरुण, तंबाखू न खाणाऱ्यांच्या बाबतीत चिंतेचा विषय म्हणून उदयास येत आहे. महाराष्ट्र राज्य हे भारतातील मुख कर्करोगाचा सर्वाधिक भार वाहणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. मुख कर्करोग हा राज्यातील पुरुषांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे व स्त्रियांमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या पाच कर्करोगांमध्ये त्याची वर्णी लागते.“हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासारखी हॉस्पिटल्स आजाराचे लवकरात लवकर निदान करण्याचे मार्ग आणि प्रगत सर्जिकल तंत्रज्ञान, अचूक पुनर्बांधणी व मल्टिडिसिप्लिनरी देखभाल यांची सांगड घालत तपासणी व आजारातून बचाव यांच्यामधील दरी सांधण्याच्या कामी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मुख कर्करोग हा अशा काही मोजक्या कॅन्सर्सपैकी एक आहे, जिथे लवकर झालेले निदान, तंत्रज्ञानाची मदत यांच्यामुळे रोगाच्या परिणतीमध्ये खरोखरच बदल घडवून आणू शकतो, मात्र जागरुकता असल्यास व रुग्णाला वेळीच आमच्याकडे पाठविले गेल्यास रुग्णाचे प्राण वाचविण्याच्या कामी आमची मदत होऊ शकते.” डॉ. सुलतान ए. प्रधान पुढे म्हणाले. ओरल कॅन्सर लवकरात लवकर दिसून आला, तर तो एक टाळता येण्याजोगा व बरा होण्याजोगा आजार आहे. त्याची खरी किंमत केवळ उपचारांमधून नव्हे, तर कृतीस होणाऱ्या विलंबातून भरावी लागते.
Sharad Pawar : विलीनीकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर आता शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Kalki 2898 AD Sequel: प्रभास अभिनीत मेगाबजेट चित्रपट ‘कल्कि 2898 एडी’ ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. नाग अश्विन दिग्दर्शित या सायन्स-फिक्शन आणि पौराणिक कथानक असलेल्या चित्रपटात अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण आणि कमल हासन यांसारखे दिग्गज कलाकार झळकले होते. जून 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतासह जगभरात बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली.
Sharad Pawar on India Us trade deal: 'भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारामुळे भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची भीती'
ट्रम्प यांनी क्युबाला ‘करार करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा’ असा इशारा दिला आहे. अमेरिका आणि क्युबा यांच्यात संघर्ष का आहे आणि अमेरिका क्युबासारख्या छोट्या देशाला इतके महत्त्व का देत आहे, याचा हा मागोवा.प्रा. जयसिंग यादवव्हेनेझुएलामध्ये लष्करी कारवाई केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शांत बसलेले नाहीत. त्यांचे जगातील अनेक देशांकडे लक्ष असले, तरी दक्षिण अमेरिकेतील क्युबा त्यांच्या डोळ्यांत जास्त सलतो आहे. रशिया आणि चीनशी क्युबाचा वाढत चाललेला दोस्ताना अमेरिकेला खुपतो आहे. त्यामुळे व्हेनेझुएलानंतर अमेरिकेने क्युबाकडे आपली वक्रदृष्टी वळवली. इराण आणि ग्रीनलँडनंतर अमेरिका क्युबाविरोधात मोहीम उघड़ू शकते. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्मवर लिहिले, की अनेक वर्षांपासून व्हेनेझुएलाकडून मिळणाऱ्या तेल आणि पैशांवर क्युबा अवलंबून होता. गेल्या आठवड्यात व्हेनेझुएलावर अमेरिकेच्या हल्ल्यादरम्यान, तेथे उपस्थित असलेले बहुतेक क्युबन लोक मारले गेले. व्हेनेझुएलाला आता इतके वर्षे ओलीस ठेवणाऱ्या गुंडस आणि खंडणीखोरांपासून संरक्षणाची गरज नाही, असे नमूद करून ट्रम्प यांनी लिहिले, की व्हेनेझुएलाकडे आता जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य असलेल्या अमेरिकेकडे त्यांचे संरक्षण आहे. क्युबाला आता तेल किंवा पैसा पाठवला जाणार नाही. मी सुचवतो, की त्यांनी खूप उशीर होण्यापूर्वी करार करावा. अमेरिका भारतासह अन्य देशांवर व्यापारी करार करण्यासाठी कसा दबाव आणते, याचे हे ज्वलंत उदाहरण. पश्चिम गोलार्धातील देशांकडे अमेरिकेचे नेहमीच लक्ष राहिले. रशिया आणि चीनशी क्युबाचे चांगले संबंध अमेरिकेला मान्य नाहीत. ट्रम्प रशियाला नाही तर चीनला मोठा धोका मानतात. त्यांना पश्चिम गोलार्धातील चीनचा प्रभाव संपवायचा आहे. ट्रम्प हे क्युबाबाबत कठोर भूमिका घेणारे एकमेव अमेरिकन अध्यक्ष नाहीत. क्युबा आणि अमेरिकेतील स्पर्धा अनेक दशकांपासून सुरू आहे. १९०२ मध्ये क्युबाला स्वातंत्र्य मिळाले आणि टॉमस एस्ट्राडा पाल्मा त्याचे पहिले अध्यक्ष झाले; परंतु प्लॅट सुधारणांमुळे हा देश अमेरिकेच्या संरक्षणाखाली राहिला. काही वर्षांनंतर एस्ट्राडा यांनी राजीनामा दिला आणि जोसे मिगुएल गोमेझ यांच्या नेतृत्वाखाली बंड झाल्यानंतर अमेरिकेने क्युबा ताब्यात घेतला. अमेरिकेच्या देखरेखीखाली क्युबामध्ये १९०९ मध्ये निवडणुका झाल्या आणि जोसे मिगुएल गोमेझ अध्यक्ष झाले; परंतु लवकरच भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकले. १९१२ मध्ये वांशिक भेदभावाविरुद्ध कृष्णवर्णीय निदर्शने दडपण्यासाठी अमेरिकन सैन्य क्युबाला परतले. १९३३ मध्ये क्युबन लष्करी अधिकारी फुलगेन्सियो बतिस्ता यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडाने जेरार्डो मचाडो यांना उलथवून टाकले. १९५३ मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी बतिस्ता राजवटीविरुद्ध अयशस्वी बंड केले. क्युबाने अमेरिकेचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या सोव्हिएत रशियाशी जवळचे संबंध निर्माण करण्यास सुरुवात करत व्यापार सुरू केला, तेव्हा अमेरिका संतप्त झाली. क्युबाने अमेरिकन कंपन्यांची मालमत्ता जप्त केली आणि अमेरिकन वस्तूंवर जास्त कर लादले. क्युबा चीनशी चांगले संबंध विकसित करू शकेल, अशी शक्यताही होती, म्हणूनच अमेरिकेने क्युबाविरुद्ध कठोर भूमिका स्वीकारली. अमेरिकेने क्युबाला आर्थिकदृष्ट्या शिक्षा करण्यास सुरुवात केली. १९६१ मध्ये अमेरिकेने क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रोंचे सरकार उलथवून टाकण्यासाठी लष्करी कारवाई सुरू केली. तथापि, ही कारवाई अयशस्वी झाली. ‘बे ऑफ पिग्ज आक्रमण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या घटनेत अमेरिकेने क्युबन बंडखोर आणि निर्वासितांविरुद्ध बळाचा वापर केला होता. क्युबन सरकार उलथवून टाकण्यासाठी हल्ला करण्यात आला; परंतु स्थानिक लोकसंख्येच्या पाठिंब्याअभावी अमेरिका आणि क्युबन बंडखोर अयशस्वी झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेची प्रतिमा खराब झाली. यानंतर क्युबाने सोव्हिएत महासंघाला त्याच्या भूभागावर गुप्तपणे अणू क्षेपणास्त्रे बसवण्याची परवानगी दिली. ऑक्टोबर १९६२ मध्ये अमेरिकन विमानांनी ही क्षेपणास्त्रे पाहिली. परिस्थिती अणुयुद्धाच्या जवळ आली होती. शेवटी, सोव्हिएत नेते निकिता ख्रुश्चेव्ह क्षेपणास्त्रे काढून टाकण्यास सहमत झाले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी १९८२ मध्ये क्युबाला ‘दहशतवाद्यांना पाठिंबा देणारा’ देश म्हणून घोषित केले. नंतर जॉर्ज बुश आणि बिल क्लिंटन यांनी हेल्म्स-बर्टन कायदा लागू केला. या कायद्यानुसार क्युबामध्ये लोकशाही स्थापित होईपर्यंत आणि कॅस्ट्रो कुटुंबाला सत्तेवरून काढून टाकल्याशिवाय निर्बंध उठवले जाणार नाहीत, असे म्हटले.बराक ओबामा यांच्या कार्यकाळात क्युबाशी अमेरिकेचे संबंध सुधारले. त्यांनी क्युबाबद्दल काहीशी उदारता दाखवली. ‘सीएफआर’च्या अहवालानुसार २००८च्या निवडणुकीदरम्यान ओबामा म्हणाले, की क्युबाला वेगळे केल्याने काहीही चांगले झाले नाही. ओबामा सत्तेत आल्यानंतर क्युबावरील प्रवासी बंधने आणि पैसे पाठवण्याचे नियम शिथिल करण्यात आले. २०१४ मध्ये एका घटनेने संपूर्ण जगाला धक्का बसला. ओबामा आणि क्युबाचे नेते राऊल कॅस्ट्रो यांनी अचानक घोषणा केली, की दोन्ही देश राजनैतिक संबंध पुन्हा स्थापित करतील. त्यानंतर क्युबाला ‘दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या’ देशांच्या यादीतून काढून टाकण्यात आले. २०१६ मध्ये ओबामा यांनी वैयक्तिकरीत्या क्युबाला भेट दिली. १९२८ नंतर अमेरिकेच्या अध्यक्षांचा क्युबाचा हा पहिलाच दौरा होता. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात प्रवेश करताच क्युबाबद्दल कठोर भूमिका घेतली, तर बायडेन थोडेसे उदार राहिले. आपल्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी ओबामा प्रशासनाचे बहुतेक निर्णय उलटवले. ट्रम्प यांनी क्युबाच्या लष्कराशी संबंधित कंपन्यांशी व्यापार थांबवला, एकट्याने प्रवास करण्यास बंदी घातली आणि क्रूझ जहाजे आणि बहुतेक उड्डाणे थांबवली. २०१९ मध्ये ट्रंप यांनी पुन्हा क्युबाला दहशतवाद्यांना पाठिंबा देणारा देश घोषित केला. या काळात क्युबामधील अमेरिकन आणि कॅनेडियन दूतावासातील कर्मचाऱ्यांना असामान्य दुखापती झाल्या. नंतर याला ‘हवाना सिंड्रोम’ असे नाव देण्यात आले. बायडेन यांच्या काळात काही नियम शिथिल करण्यात आले. त्यामुळे क्युबामधील कुटुंबांना अधिक पैसे पाठवता आले आणि क्युबाला अधिक विमान उड्डाणे सुरू झाली. त्यानंतर २०२१ मध्ये अन्न, औषध आणि विजेच्या कमतरतेमुळे त्रस्त असलेल्या क्युबन लोकांनी निषेध करण्यास सुरुवात केली. सरकारने निदर्शकांना अटक केली आणि इंटरनेट बंद केले. बायडेन प्रशासनाने क्युबावर नवीन निर्बंध लादले. क्युबातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. लोक अमेरिकेत पळून जाऊ लागले. व्हेनेझुएलाच्या घटनेनंतर ट्रम्प यांचे कोणतेही विधान हलक्यात घेणे चुकीचे ठरेल.
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२ तासांनंतरही पूर्णपणे सुटलेला नाही. खंडाळा घाटातील अडोशी बोगद्याजवळ प्रोपिलीन गॅसचा टँकर उलटल्याने झालेल्या भीषण गॅस गळतीमुळे हा महामार्ग अक्षरशः ठप्प झाला. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवल्याने प्रवाशांना रात्रभर अन्न-पाण्याविना महामार्गावरच ताटकळत राहावे लागले.नेमकी घटना काय?Mumbai Pune Express Highway - Tanker Accident #mumbaiexpressway #accident pic.twitter.com/P0UlFzK0jl— Amit Gaikwad (@intelegency3) February 3, 2026मंगळवारी सायंकाळी वेगात असलेला गॅस टँकर अडोशी बोगद्याजवळील उतारावर नियंत्रण सुटल्याने उलटला. टँकरमधील 'प्रोपिलीन' हा गॅस अत्यंत ज्वलनशील आणि वजनाने जड असल्याने तो परिसरात पसरू लागला. कोणत्याही क्षणी स्फोट होण्याची भीती असल्याने प्रशासनाने तातडीने २५ किमीचा परिसर हाय अलर्टवर ठेवला आणि वाहनांची हालचाल पूर्णपणे रोखली. हजारो प्रवासी, ज्यात लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींचा समावेश होता, ते अन्न, पाणी आणि स्वच्छतागृहांच्या सुविधेविना १२-१२ तास रस्त्यावर अडकून पडले होते. सोशल मीडियावर अनेकांनी आपला संताप व्यक्त करत एक्सप्रेसवेची अवस्था 'पार्किंग लॉट' सारखी झाल्याचे म्हटले. काही प्रवाशांनी गाडीत बसून कंटाळल्यामुळे चक्क महामार्गावरच बसणे किंवा झोपणे पसंत केले.https://prahaar.in/2026/02/04/vehicles-ready-for-the-carriage-of-the-mayor-deputy-mayor-and-committee-chairmen/सध्या स्थिती काय ?घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन NDRF, महामार्ग पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने थोडासा निष्काळजीपणाही मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देऊ शकला असता, त्यामुळे अत्यंत सावधगिरीने टँकर रिकामे करण्याचे काम सुरू होते. मध्यरात्री १२:३० ते १ वाजेच्या सुमारास पोलिसांना एक मार्गिका (Lane) सुरू करण्यात यश आले, ज्यामुळे अडकलेली वाहने हळूहळू पुढे सरकू लागली. मात्र, पूर्ण वाहतूक सुरळीत होण्यासाठी बुधवारची सकाळ उजाडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलीस आणि बचाव पथकाचे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून गॅस गळती रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत. प्रवाशांना सध्या या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.प्रवाशांचा संतापअपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन सेवा आणि महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, मात्र उलटलेला टँकर हटवणे आणि गॅस गळती सुरक्षितरीत्या रोखणे हे अपेक्षेपेक्षा जास्त आव्हानात्मक ठरले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून मध्यरात्री एनडीआरएफ (NDRF) च्या तुकड्याही घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या होत्या. खोपोलीजवळ अडकलेल्या एका वसई-पुणे एसटी बसच्या चालकाने सांगितले की, सुरुवातीला पुण्याकडे जाणारी वाहतूक संथ होती, पण नंतर चार तासांहून अधिक काळ आम्ही एकाच जागी उभे आहोत; ही कोंडी साधारण २५ किमीपर्यंत असावी. चेंबूरहून शिवनेरी बसने प्रवास करणारे भगतसिंग शेळके यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले की, प्रवास सुरू करताना आम्हाला या कोंडीची कल्पना नव्हती, पण बसमध्ये असताना सोशल मीडियावरील पोस्ट पाहून परिस्थिती किती गंभीर आहे हे उमजले. मध्यरात्र उलटून गेली तरी आम्ही रस्त्यावरच अडकलो होतो. महामार्ग सुरक्षा पथकाच्या (HSP) अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, टँकरमधील गॅस अत्यंत ज्वलनशील आणि वजनाने जड असल्याने कोणताही धोका पत्करता येणार नव्हता. हे मदतकार्य पूर्ण होऊन रस्ता मोकळा व्हायला पहाटेचे ४ वाजतील, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता.
पुन्हा एकदा सोन्याचांदीच्या दरात वाढ
मुंबई : अमेरिकेच्या विमानवहाक नौकेच्या दिशेने येत असलेले एक इराणी ड्रोन पाडण्यात आले आहे. ही बातमी अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा अमेरिका - इराण युद्धाची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवार ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सोन्याचांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ दिसून आली. वाढत्या दरामुळे मध्यमवर्गीयांसाठी सोन्याची अथवा चांदीची खरेदी करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे चित्र आहे.मुंबईत २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर एक लाख साठ हजार ५३० रुपये एवढा झाला आहे. याआधी मंगळवार ३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर एक लाख त्रेपन्न हजार ९३० रुपये होता. थोडक्यात सांगायचे तर २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याच्या दरात अवघ्या २४ तासांत सहा हजार सहाशे रुपयांची वाढ झाली आहे.मुंबईत २२ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर एक लाख ४७ हजार १५० रुपये एवढा झाला आहे. याआधी मंगळवार ३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत २२ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर एक लाख ४१ हजार १०० रुपये होता. थोडक्यात सांगायचे तर २२ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याच्या दरात अवघ्या २४ तासांत सहा हजार पन्नास रुपयांची वाढ झाली आहे.मुंबईत एक किलो चांदीचा दर तीन लाख वीस हजार रुपये एवढा झाला आहे. याआधी मंगळवार ३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत एक किलो चांदीचा दर दोन लाख ऐंशी हजार रुपये एवढा होता. थोडक्यात सांगायचे तर मुंबईत एक किलो चांदीचा दर अवघ्या २४ तासांत ४० हजार रुपयांनी वाढला आहे.
भारत आणि युरोपीय महासंघामध्ये खुला व्यापार करार झाल्यानंतर अमेरिकेला चांगल्याच मिरच्या झोंबल्या. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकामागून एका देशाला अतिरिक्त कर लादत आहेत. भारतावरही त्यांनी पन्नास टक्के आयात शुल्क लादले. म्हणूनच भारताने जगातील अनेक देशांबरोबर करार करण्यासाठी वेगवान पावले उचलली. म्हणूनच हा ‘गेमचेंजर’ करार अमेरिका, चीनसारख्या देशांना खुपणे स्वाभाविक आहे.शिवाजी कराळेभारत-युरोपीय महासंघातील मुक्त व्यापार करार हा दोन अब्ज लोकांच्या बाजारपेठेसाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी करार आहे. या कराराला ‘मदर ऑफ ऑल डील्स’ म्हटले जात आहे. भारतासोबतच्या मुक्त व्यापार करारांतर्गत युरोपीय महासंघाने दिलेल्या आयात शुल्क सवलतींमुळे२७ राष्ट्रांच्या गटाला होणारी देशाची निर्यात वाढून देशांतर्गत उत्पादन वाढेल. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताचा युरोपीय महासंघाचा द्विपक्षीय वस्तूंचा व्यापार १३६.५३ अब्ज डॉलर्सचा होता. त्यात ७५.८५ अब्ज डॉलर्सची निर्यात आणि ६०.६८ अब्ज डॉलर्सची आयात होती. यामुळे युरोपीय महासंघ भारताचा सर्वात मोठा वस्तू-व्यापार भागीदार बनला आहे. भारताच्या एकूण निर्यातीपैकी युरोपीय महासंघ बाजारपेठेचा वाटा अंदाजे १७ टक्के आहे, तर भारतात युरोपीय महासंघाची निर्यात भारताच्या एकूण परदेशी आयातीपैकी नऊ टक्के आहे. हा करार पुढील वर्षाच्या सुरुवातीला लागू होण्याची अपेक्षा आहे. युरोपीय महासंघ हा जगातील सर्वात मोठा आयातदार आहे. ‘कराराची जननी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या करारामुळे भारताला महत्त्वपूर्ण फायदे मिळण्याची अपेक्षा आहे. भारतातील जवळजवळ सर्व निर्यात वस्तू २७ युरोपीय देशांमध्ये शून्य किंवा अत्यंत कमी कर दराने प्रवेश करतील. देशातील कृषी उत्पादक, सेवा पुरवठादार आणि औषधनिर्माण आणि कापड उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना याचा फायदा होईल. यामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तथापि, हा करार अमेरिका आणि चीनच्या आर्थिक गतिमानतेसाठी एक नवीन आव्हान निर्माण करू शकतो.अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क आणि चीनने संवेदनशील वस्तूंवर निर्यात निर्बंध लादून निर्माण केलेला दबाव या करारामुळे निरर्थक ठरण्याची शक्यता आहे. ताज्या करारामुळे स्थिर लोकसंख्या असलेल्या युरोपीय देशांना मोठी बाजारपेठ मिळेल. या करारामुळे युरोपीय संघालाही लक्षणीय फायदा होण्याची अपेक्षा आहे. युरोपीय देश सध्या उच्च महागाई आणि आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. लोकसंख्या वाढीमध्ये लक्षणीय घट झाल्यामुळे तेथे वस्तूंचा वापर थांबत आहे. या परिस्थितीत युरोपीय कंपन्यांना १.४ अब्ज लोकसंख्या असलेला भारतासारखा देश मित्र म्हणून समोर आला आहे. तो त्यांच्या वस्तूंसाठी एक प्रमुख केंद्र बनू शकतो. यामुळे संपूर्ण युरोपची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. इटली आणि फ्रान्ससारखे देश महागड्या वाइन उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहेत. आतापर्यंत भारतात या वाइनच्या विक्रीवर शंभर टक्के किंवा त्याहून अधिक कर आकारला जात होता. तथापि, करारानंतर हे दर सुमारे दहा टक्क्यांपर्यंत कमी केले जाऊ शकतात. यामुळे भारतातील परदेशी वाइनची विक्री आणि युरोपचा नफा वाढू शकतो. परिणामी, भारतीय वाइनप्रेमींना परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाच्या परदेशी वाइन उपलब्ध होतील.भारतात महागड्या परदेशी वाहनांच्या खरेदीदारांचा मोठा ग्राहकवर्ग आहे. मात्र युरोपीय बनावटीच्या कार खरेदी करण्यासाठी जादा कर लागतात. ते बहुतेकदा वाहनांच्या किमतीइतकेच असतात. त्यामुळे नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वाहनाची खरेदी किंमत दुप्पट होते. तथापि, आता भारत-युरोपीय व्यापार करारानंतर हे कर लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे युरोपीय देशांना भारतात उच्च दर्जाच्या कार विकण्याची संधी मिळेल आणि भारतातील नवश्रीमंतांना परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाच्या कार मिळू शकतील. भारतात स्वस्त कामगार उपलब्ध होतील, रोजगार वाढेल. अमेरिकेने देशात काम करणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी व्हिसा नियम कडक केले आहेत. आज अमेरिका परदेशी नागरिकांना नोकरी देण्यापासून रोखत असल्याचे दिसून येते. तथापि, युरोपीयन अर्थव्यवस्था सेवा क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. ती त्यांच्या एकूण जीडीपीमध्ये ७० टक्के योगदान देते. परिणामी, युरोपीयन सेवा कंपन्यांना भारतात परवडणारे, कुशल कामगार उपलब्ध होतील. यामुळे भारत आणि युरोप या दोघांनाही लक्षणीय फायदे मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अमेरिका भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यापासून रोखण्यासाठी उच्च शुल्क लादत होती. ही रणनीती काम करत असल्याचे दिसून येते. कारण रिलायन्ससह अनेक भारतीय कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी लक्षणीयरीत्या कमी केली आहे. ट्रम्प युरोपलाही अशाच प्रकारच्या धमक्या देत आहेत. मात्र ताज्या कराराबाबत नाराजी दाखवणारी अमेरिका हा खेळ आपल्या हातून निसटताना पाहत आहे.अमेरिका आपल्या अर्थव्यवस्थेच्या बळावर युरोपीय देशांना धमकावण्याचा प्रयत्न करत होती; परंतु युरोपला भारतात मोठी आणि परवडणारी बाजारपेठ मिळाल्याने अमेरिकेला आपले डावपेच अपयशी ठरताना दिसत आहेत. ट्रम्प प्रशासनातील ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी याला ‘युरोपने अमेरिकेशी केलेला विश्वासघात’ म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे, की या करारात सामील होऊन युरोप स्वतःविरुद्ध लढल्या जाणाऱ्या युद्धाला अप्रत्यक्षपणे वित्तपुरवठा करत आहे. अमेरिका रशियन तेल खरेदी करण्यापासून रोखण्यासाठी युरोपीय देशांवरही शुल्क लादण्याबद्दल बोलत होती. तथापि, युरोपला भारतात मोठी बाजारपेठ मिळाल्याने या शुल्काचे महत्त्व जवळजवळ संपुष्टात येऊ शकते. या करारामुळे भारतातील सर्वात असुरक्षित आणि ‘एमएसएमई’ क्षेत्राला फायदा होण्याची शक्यता आहे. भारत अजूनही अमेरिका आणि युरोपला तयार कृषी उत्पादने, कपडे आणि औषधे निर्यात करतो. देशातील सर्वात असुरक्षित किंवा मध्यमवर्ग कपडे आणि कृषी उत्पादनांमध्ये काम करत असल्याने युरोपीय देशांसोबत वाढलेल्या व्यापाराचा या वर्गाला थेट फायदा होण्याची शक्यता आहे. यामुळे या क्षेत्रांमध्ये रोजगारनिर्मिती वाढण्याची शक्यता आहे. युरोपीय संघ आणि भारत यांच्यातील या करारावर अमेरिका खूश नाही. त्यांनी भारत आणि युरोपीय महासंघाला ‘देशद्रोही’ही म्हटले होते, तर रशियाकडून तेल आयातीसाठी भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादला होता. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार अद्याप अंतिम झालेला नाही, तर युरोपीय महासंघात करार अंतिम झाला आहे.भारतीय निर्यातदारांना २७ युरोपीय देशांमध्ये अंदाजे ४५० दशलक्ष उच्च-उत्पन्न ग्राहकांना शून्य दरात किंवा अत्यंत कमी दराने प्राधान्याने प्रवेश मिळेल. युरोपीय महासंघ सध्या १२५ अब्ज डॉलर्स किमतीचे कापड आणि वस्त्रोद्योग आयात करते. यामध्ये भारताचा वाटा फक्त पाच ते सहा टक्के आहे. दुसरीकडे, चीनचा बाजारहिस्सा तीस टक्के असून बांगलादेश आणि पाकिस्तानचा एकत्रित बाजार वीस टक्के आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानला युरोपीय महासंघाकडून शून्य कर आकारणीचा फायदा होतो. खुल्या व्यापार करारामुळे भारत या देशांच्या करसमानतेत येईल. परिणामी, अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीमुळे तोटा सहन करणाऱ्या भारतीय कापड उद्योगाला आपली उत्पादने विकण्यासाठी नवी बाजारपेठ मिळेल.पादत्राणे, चामड्याच्या वस्तू, रत्ने आणि दागिने यासारख्या क्षेत्रांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ दिसून येईल. भारतीय औषध कंपन्यांसाठी केवळ कर कपातीतच मुख्य फायदा नाही, तर नियामक अडथळे कमी करणे आणि मानकांची परस्परमान्यता याचादेखील फायदा आहे. यामुळे भारतीय जेनेरिक औषधे आणि विशेष रसायने युरोपीय बाजारपेठेत अधिक सहजपणे प्रवेश करू शकतील. यामुळे भारताचे अमेरिकेवरील अवलंबित्व कमी होईल. या करारामुळे युरोपीय गुंतवणूक स्वच्छ ऊर्जा, अक्षय ऊर्जा, औषधनिर्माण आणि प्रगत उत्पादन यासारख्या क्षेत्रांकडे भारतात आकर्षित होईल. शिवाय भारतीय कंपन्या युरोपीय पुरवठा साखळ्यांमध्ये एकत्रित होतील. त्यामुळे जागतिक उत्पादन नेटवर्कमध्ये भारताचे स्थान मजबूत होईल. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शेती आणि दुग्धशाळेसारख्या संवेदनशील क्षेत्रांना कराराच्या व्याप्तीतून वगळले आहे.
UPI Global Payment: भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली लवकरच जागतिक स्तरावर एक नवीन ओळख मिळवू शकते.
Patan News : गावात घुसला गवा अन् उकिरड्यात अडकला; ग्रामस्थांची पळापळ
संजय पाटील Patan News : पाटण तालुक्यातील येराड गावात बुधवारी सकाळी रानगवा घुसल्याने ग्रामस्थांची चांगलीच धावपळ उडाली. गावातील गणेश हरी साळुंखे यांच्या घराशेजारी असलेल्या उकिरड्यात गवा अडकल्याची घटना पहाटे ग्रामस्थांच्या लक्षात आली आणि बघ्यांची एकच गर्दी जमली. काहीवेळ गवा घाबरलेल्या अवस्थेत सुटण्याची धडपड करीत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर गव्याने स्वतः प्रयत्न करून […]
World Cancer Day: कर्करोग हा जगातील सर्वात गंभीर आणि जीवघेण्या आजारांपैकी एक मानला जातो. दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू या आजारामुळे होतो. कर्करोगाबाबत जनजागृती वाढावी, वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार व्हावेत यासाठी दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक कर्करोग दिन’ साजरा केला जातो.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शरद पवारांची एका वाक्यात पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य करत पहिली प्रतिक्रिया दिली.
महापौर, उपमहापौरांसह समित्यांच्या अध्यक्षांच्या सारथ्यासाठी वाहने सज्ज
महापौरांना इनोव्हा, तर समिती अध्यक्षांना भगव्या पट्यांच्या स्कॉर्पिओसचिन धानजी मुंबई : मुंबईच्या महापौर तसेच उपमहापौर पदासाठी येत्या बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी निवडूक होणार असून त्यानंतर वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे महापौरांसह नव्याने निवडून येणाऱ्या समित्यांच्या अध्यक्षपदांचे सारथ्य करण्यासाठी त्यांची वाहनेही चालकांसह सज्ज होत आहेत . यामध्ये महापौरांसाठी नव्याने इनोव्हा एन ही गाडी खरेदी करण्यात आली आहे. या वाहनांची नोंदणी प्रक्रिया दोन दिवसांमध्ये पूर्ण होवून महापौर विराजमान होण्यापूर्वी हे वाहन त्यांच्या सेवेसाठी असणार आहे.तर उपमहापौरांहस विविध समिती अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ गाड्या असतील आणि यावर भगव्या रंगाच्या पट्टयांचे आकर्षक डिझाईन असेल.मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर आता महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यानंतर स्थायी समिती, शिक्षण,सुधार तसेच बेस्ट समिती अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. त्यानंतर विशेष समित्या आणि १८ प्रभाग समित्यांच्या निवडणूक होणार आहे. त्यामुळे मागील पावणे चार वर्षांमध्ये नगरसेवक आणि पर्यायाने महापौर व विविध समित्यांचे अध्यक्ष नसल्याने त्यांच्या वाहनांचा वापर अधिकारी वर्गाने केला होता. त्यामुळे आता नवनिर्वाचित महापौर तसेच उपमहापौरांसह विविध वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी वाहने खरेदीची प्रक्रिया घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने पार पडली आहे.त्यानुसार नव्या महापौरांसाठी नव्याने इनोव्हा एन ही गाडी खरेदी केली जात आहे. ही गाडी इव्ही तसेच पेट्रोलवर आधारीत आहे. अशाप्रकारच्या इनोव्हा वाहनांचा वापर सध्या महापालिकेत अतिरिक्त आयुक्त हे करत आहेत.. तर वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी १२ स्कॉर्पिओंचीही खरेदी केली जात आहे. अध्यक्षांच्या या स्कॉर्पिओ गाड्यांची ओळख व्हावी म्हणून यावर भगव्या रंगाच्या पट्टयांचे डिझाईन तयार करण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्षांची वाहने सहजपणे ओळखली जाणे शक्य होणार आहे.घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापौर, उपमहापौरांसह विविध समित्यांच्या अध्यक्षपदासाठी नवीन वाहन खरेदीची प्रक्रिया सुरु केली आहे. ही वाहने आता उपलब्ध होत असून याची आरटीओ नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये महापालिकेच्या ताफ्यात येतील अशाप्रकारचा विश्वास व्यक्त केला. महापौरांसाठी इनोव्हा आणि इतर अध्यक्षांना स्कॉर्पिओ गाड्या खरेदी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सगळ्या जगावर टॅरिफ युद्ध लादणारे अंकल सॅम यांनी अखेर नमते घेतले. भारतावर लादलेले ५०% टॅरिफ १८ टक्क्यांवर आणल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे भारत-अमेरिकेत होणाऱ्या मुक्त व्यापार कराराचा मार्ग मोकळा झाला.अमेरिकेने भारतावर लादलेला टॅरिफ २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणणे आणि दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापार समझोता करण्यासंदर्भात ठोस प्रगती करणे या दोन्ही गोष्टी भारतासाठी अत्यंत मोलाच्या आणि उपयुक्त आहेत. या करारावर उभय देशांमध्ये बोलणी झाली ती अत्यंत सकारात्मक. त्यांना लवकरच अंतिम स्वरूप देण्यात येईल असे सांगण्यात येते. अर्थात ट्रम्प यांनी भारतावर लादलेला टॅरिफ १८ टक्क्यांवर आणल्याचे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांचे आभार मानले. आता याचा फायदा कोणत्या क्षेत्रांना होईल याचा विचार केला तर भारतातील वस्त्रोद्योग, चामड्याच्या वस्तू आणि कार्पेट्स यांच्या निर्यातीला यातून मोठा लाभ होणार आणि यापेक्षाही मोठा फायदा हा की या करारामुळे मध्यम मुदतीचा मॅक्रो बुस्ट व्यापार आणि भांडवली ओघातून मिळेल. भारताला आता रशियाकडून तेलाची खरेदी कमी करावी लागणार आणि ते आवश्यक होते. कारण अमेरिकेला नाराज करून भारताला तेलाची खरेदी परवडणार नव्हती आणि त्या बदल्यात व्हेनेझुएलाकडून तेलाची खरेदी करावी लागेल. भारत अमेरिकेविरुद्धचे भारताचे टॅरिफ आणि नॉन टॅरिफ अडथळे शून्यावर आणले जातील. अर्थात काही प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतावर अनेकदा आरोप केला की भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवून रशियाच्या युद्धाला अप्रत्यक्ष निधी पुरवत आहे. ट्रम्प यांनी दावा केला, की मोदी यांनी रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास आणि व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्यास संमती दर्शवली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, की वाढत्या भू-राजकीय अनिश्चिततेमुळे भारतीय अर्थव्यवस्था लवचिक राहिली आणि आता अनेक महिन्यांच्या वाटाघाटीनंतर त्यात स्पष्टता आली. पण सर्वात मोठा लाभ हा आहे, की टॅरिफ कपातीनंतर भारतातील निर्यातदारांना अमेरिकेला निर्यात वाढवण्याची आशा आहे. इतकेच नव्हे तर भारतातून सीफुड निर्यातही वाढण्याची शक्यता आहे.या कराराचा दोन्ही देशांना फायदा आहे. भारत आता अमेरिकेकडून पेट्रोलियम, संरक्षण आणि औषधे तसेच दूरसंचार उत्पादने आणि विमाने खरेदी करेल. यामुळे भारताच्या संरक्षण सिद्धतेत वाढ होईल आणि अमेरिकन ऊर्जा आणि कोळसा भारत खरेदी करू शकतो याचा फायदा संबंधित क्षेत्रांना होईल आणि भारतीय शेतकरी यांचे जीवनमान सुसह्य होईल. अर्थात हा पहिला टप्पा आहे आणि येत्या काही महिन्यांत अधिक व्यापक करारावर वाटाघाटी केल्या जातील. भारत-अमेरिका व्यापार करारातील संदिग्धता आता नष्ट झाल्यामुळे भारताची निर्यात वाढेल. पण यासोबतच ट्रम्प यांनी एचवनबी व्हिसा शुल्क वाढवल्यामुळे आणि त्यांच्या अमेरिका फर्स्ट या धोरणामुळे इमिग्रेशन धोरण कडक केल्यामुळे भारतीयांना कामावर ठेवणे अमेरिकेतील उद्योगांना शक्य नाही. सेवा क्षेत्रातील धोरणाबाबत अस्पष्टता कायम आहे. भारत-अमेरिका हे दोन्ही देश राजकीय विषयांवर तोडगे काढतात; परंतु महत्त्वाचे आर्थिक प्रश्न तसेच ठेवतात असे चित्र निर्माण झाले. भारत-अमेरिका व्यापार करारामुळे मेड इन इंडिया उपक्रमासाठी लाभदायक बाब ठरली आहे असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले. कारण आता १८ टक्के टॅरिफ परस्पर आकारला जाईल. यामुळे दोन्ही देशांना याचा लाभ होईल आणि त्यामुळे ही आनंदाची बातमी आहे, असे त्यानी म्हटले आहे. अर्थात या घटनेमुळे एकूणच भारतीय अर्थजगतात आनंददायी वातावरण असले तरीही राजकीय हालचाली वाढल्या. काँग्रेसने मोदी सरकारवर तीव्र हल्ला चढवला असून काँगेस नेते रमेश यांनी शेलक्या शब्दांत टीका केली, की वॉशिंग्टनमध्ये मोगॅँबो खूश हुआ. यातील उपरोध लक्षात यावा असा आहे. पण भारत रशियापासून दूर गेलेला नाही.भारताने अमेरिकेशी केवळ करार केला आहे आणि तो दोन्ही देशांच्या फायद्याचा आहे. जयराम रमेश यांनी टीका केली, की हा करार खरेच इतका जर मोठा असता तर त्याची घोषणा भारताने का केली नाही. पण रमेश यांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही. कारण या करारामुळे भारतातील निर्यातदारांना आणि इतर अनेक व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे. मोठ्या निर्णयांची माहिती आम्हाला अमेरिकेकडून का मिळत आहे असा त्यांचा सवाल आहे. पण भारताने यापूर्वीही अमेरिकेला कठोर उत्तर दिले होते आणि भारत अमेरिकेच्या आहारी नाही हे स्पष्ट केले होते. खरे कारण आहे ते टॅरिफ अस्त्रामुळे भारत संतप्त झाला होता आणि त्याने अमेरिका नाही तर नाही युरोपशी ट्रेड वाटाघाटी सुरू केल्या. यामुळे ट्रम्प यांनी १८ टक्के टॅरिफ लावण्याची तयारी दर्शवली. ट्रम्प यांनी भारतासमोर गुडघे टेकले. यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार ५०० अब्ज डॉलर इतका वाढू शकतो. अमेरिकन कंपन्या भारतात याव्यात अशी भारताची इच्छा आहे आणि भारताने म्हणूनच कंपन्यांसाठी टॅक्स होलिडे वाढवला. ट्म्प यांना भारताशी हा करार करण्याशिवाय पर्यायच नव्हता. भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय करार होणे हा ऐतिहासिक क्षण आहे हे मत राजनाथ यांनी व्यक्त केले. पण यापेक्षा मोदी यांनी अशी खेळी खेळली आहे, की चीनची अडचण वाढली. आता चीनचा प्रशांत महासागरात प्रभाव कमी होऊन भारताचे सामर्थ्य वाढले. त्यामुळे चीनचा संताप होणे साहजिक आहे. इतकेच नव्हे तर भारत आणि अमेरिका यांच्यातील करारामुळे क्वाड अंतर्गत चीनच्या सीमावर्ती भागात तणाव वाढला आहे.चीनची प्रशांत महासागरात मनमानी करण्याची प्रवृत्ती वाढली होती तिला आळा बसला. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या चीनमधून आपला व्यवसाय अन्यत्र वळवत आहे आणि यामुळेही चीनच्या आर्थिक वर्चस्वाला हादरा बसत आहे. त्यापेक्षा आणखी एक महत्त्वाचा परिणाम असा, की भारत अमेरिका सहकार्यामुळे चीनच्या सीमेवरील हालचालींवर मर्यादा येत आहे. भारत आता अधिक सतर्क झाल्यामुळे चीनला दडपशाही करणे अवघड झाले. भारत आता जागतिक दक्षिणमध्ये आपला प्रभाव वाढवत असल्यामुळे चीनची आशियातील एकाधिकारशाही कमी होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, की विरोधक टीका करत होते. पण आम्ही संयम राखला आणि आज त्याचे परिणाम देशासमोर आहे. उत्पादन वाढवा, दर्जेदार उत्पादन तयार करा आणि देशाला विकसित भारत बनवण्याच्या दिशेने मदत करा असे आवाहन त्यानी केले. हाच या संपूर्ण विवेचनाचा मूलमंत्र आहे.
पुण्याच्या राजकारणाचे अजितदादांनंतरचे संक्रमण
पुण्याच्या राजकारणात पालकमंत्रीपदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिल्हा नियोजन समिती, विकास निधीचे वाटप, प्रशासकीय अधिकाऱ्यांवरील प्रभाव, तसेच स्थानिक आमदार-खासदारांमधील समन्वय या सगळ्यांचा केंद्रबिंदू म्हणजे पालकमंत्री. अजित पवारांच्या काळात हे पद अत्यंत ताकदीने वापरले गेले. भविष्यात हे पद कोणाकडे जाते, यावरच पुण्याच्या विकासाचा वेग आणि राजकीय स्थैर्य ठरणार आहे.वार्तापत्र मध्य महाराष्ट्र प्रतिनिधीपुण्याच्या राजकारणात गेली दोन दशके सातत्याने केंद्रस्थानी असलेले नाव म्हणजे अजित पवार. सत्तेतील चढउतार, पक्षांतर्गत संघर्ष, विरोधकांशी टक्कर आणि विकासाच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका यामुळे त्यांनी पुण्याच्या राजकारणावर आपली छाप उमटवली. मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमुळे आणि सत्ताकेंद्रांच्या फेरबदलामुळे ‘अजित पवारांनंतर पुण्याचे राजकारण कसे असेल?’ हा प्रश्नŽ आता अधिक ठळकपणे उपस्थित होत आहे. विशेषत: पुण्याच्या पालकमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागते, यावर भविष्यातील राजकीय दिशा ठरण्याची शक्यता आहे. अजित पवार हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नव्हते, तर पुणे जिह्याच्या सत्ताकारणातील एक मजबूत केंद्र होते.सिंचन, नगरविकास, अर्थकारण आणि सहकार या क्षेत्रांतील त्यांचा अनुभव पुण्याच्या ग्रामीण व शहरी राजकारणाला दिशा देणारा ठरला. पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड, बारामती, दौड, इंदापूर, शिरूर अशा विविध भाzगांमध्ये त्यांच्या राजकीय पकडीचे वेगवेगळे स्वरूप दिसून आले. पालकमंत्रीपद ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून, जिह्याच्या सत्तासमीकरणांवर नियंत्रण ठेवणारी भूमिका असल्याने अजित पवारांनी या पदाचा प्रभावी वापर केला. गेल्या २५ वर्षांत पुणे जिह्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते तयार झाले. अजित पवार यांच्या सावलीतच वाढले. अजित पवार हेच प्रमुख आधारस्तंभ होते. अजित पवार हेच त्यांच्या दृष्टीने ‘पालकां’च्या भूमिकेत होते. मतदारसंघातील पेच असो, विकासकामे असो त्यातून मार्ग काढण्यासाठी अजित पवार हेच नेते असायचे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा ते आधार असायचे. प्रशासकीय कामकाजाची माहिती असलेले अजित पवार हे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांसाठी ‘पालकत्वा’च्या भूमिकेत राहिले. कोरोनाच्या काळात बैठका घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देत असायचे. अजित पवार सक्रिय केंद्रस्थानी नसतील, तर पुण्याच्या राजकारणात निर्माण होणारी पोकळी सहज भरून निघणारी नाही. पुणे जिल्ह्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी स्पर्धा अधिक तीव्र होईल. आतापर्यंत एका प्रभावी नेत्याभोवती फिरणारे अनेक निर्णय आता सामूहिक नेतृत्व, गटबाजी आणि अंतर्गत संघर्षातून मार्ग काढतील, अशी चिन्हे आहेत. पुण्याच्या राजकारणात पालकमंत्रीपदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिल्हा नियोजन समिती, विकास निधीचे वाटप, प्रशासकीय अधिकाऱ्यांवरील प्रभाव, तसेच स्थानिक आमदार-खासदारांमधील समन्वय या सगळ्यांचा केंद्रबिंदू म्हणजे पालकमंत्री. अजित पवारांच्या काळात हे पद अत्यंत ताकदीने वापरले गेले. भविष्यात हे पद कोणाकडे जाते, यावरच पुण्याच्या विकासाचा वेग आणि राजकीय स्थैर्य ठरणार आहे.अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात आपली पकड टिकवून ठेवण्यासाठी नव्या नेतृत्वाला पुढे आणावे लागेल. बारामती पट्ट्यात अजूनही पक्ष मजबूत असला, तरी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे वर्चस्व वाढत आहे. पिंपरी-चिंचवड तर अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांनी विकासकामे करून मतदारांना आपलेस करून घेतले होते. पालकमंत्रीपद जर राष्ट्रवादीकडे राहिले, तर पक्षाला संघटन मजबूत करण्याची संधी मिळू शकते. मात्र अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाचा अभाव ही मोठी अडचण ठरू शकते. भाजपने गेल्या काही वर्षांत पुणे शहर आणि परिसरात भक्कम पाय रोवले आहेत. महापालिका राजकारण, शहरी मतदारांचा पाठिंबा आणि केंद्र-राज्य समन्वय या मुद्द्यांवर भाजप स्वत:ला सक्षम पर्याय म्हणून सादर करत आहे. अजित पवारांनंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा फायदा घेत पुण्याचे पालकमंत्रीपद आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप प्रयत्नशील राहील, हे निश्चित. पालकमंत्री भाजपचा असेल, तर पुण्याच्या विकास धोरणात केंद्र सरकारच्या योजनांचा प्रभाव अधिक दिसू शकतो. नेतृत्वातील बदलांचा थेट परिणाम प्रशासनावर होतो. अजित पवारांच्या काळात प्रशासनावर असलेला दबाव, निर्णयक्षमता आणि वेग पुढेही तसाच राहील का, हा प्रŽश्न महत्त्वाचा आहे. पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या जिल्ह्यासाठी पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, पर्यावरण आणि ग्रामीण विकास या मुद्द्यांवर ठोस निर्णय घेणारा पालकमंत्री आवश्यक आहे. अजित पवारांनंतर पुण्याचे राजकारण एका संक्रमणाच्या टप्प्यावर उभे आहे. पालकमंत्रीपद ही या संक्रमणाची गुरुकिल्ली ठरणार आहे. सक्षम, अनुभवसंपन्न आणि सर्वपक्षीय समन्वय साधणारा पालकमंत्री मिळाल्यास पुण्याचा विकास मार्गी लागू शकतो. अन्यथा सत्तासंघर्ष, गटबाजी आणि राजकीय अस्थैर्य यामुळे जिह्याच्या प्रगतीला अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात पुण्याच्या राजकारणात नेतृत्वापेक्षा दृष्टिकोन आणि पदापेक्षा कार्यक्षमता अधिक महत्त्वाची ठरणार आहे.अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची कौटुंबिक पातळीवर प्रगल्भता दिसून आली. आता राजकीय महत्त्वाकांक्षा आणि ती पूर्ण करण्यासाठी ते कोणता निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यामुळे राज्यसभेत एक जागा रिक्त झाली आहे. तसेच अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. यापैकी एका ठिकाणी जाण्याचा निर्णय पार्थ पवार हे घेणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांनी निवडणूक लढविली होती. सद्य:स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र येण्याची शक्यता नसल्याने बारामतीत पोटनिवडणुकीत कोण उमेदवार असणार, याबाबत पवार कुटुंबाला निर्णय घ्यावा लागणार आहे. या जागेवर पार्थ पवार यांनी दावा केल्यास पवार कुटुंबासमोर पुन्हा एकदा प्रश्न उभा राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या घेतील, असे अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’तील नेत्यांकडून सांगण्यात आले. पार्थ पवार यांनी बारामतीतील जागेवर दावा केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून कोणती भूमिका घेतली जाणार, हे देखील महत्वाचे ठरणार आहे.
भारतीय शेअर बाजार वधारला, बाजारात उत्साहाचे वातावरण
मुंबई : मुक्त व्यापार करारांच्या बाबतीत भारताची प्रगती उत्साहवर्धक आहे. युरोपियन युनियन सोबतच्या करारामुळे भारताला एकाचवेळी युरोपमधील २७ देशांची महाकाय बाजारपेठ खुली झाली आहे. भारताने EU व्यतिरिक्त निवडक देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत. या करारांमुळे भारत आता एकट्या अमेरिकेच्या बाजारपेठेवर अवलंबून नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच भारतासोबत लवकरच मुक्त व्यापार करार करत असल्याचे जाहीर केले आहे. भारतावरी आयातशुल्क अर्थात टॅरिफमध्ये कपात करत असल्याचेही ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. ट्रम्प यांच्या या घोषणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या वातारणाचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे.बुधवार ४ फेब्रुवारी २०६ रोजी सकाळच्या सत्रात शेअरची खरेदी झाली. प्रामुख्याने तेल व्यापाराशी संबंधित कंपन्या आणि भारतीय तेलशुद्धीकरण कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. भारतात पायाभूत सुविधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि देशात कार्यरत संरक्षण क्षेत्रातील कंपन्या यांच्याही शेअरची खरेदी उत्साहाने होत आहे. यामुळे मुंबईचा शेअर बाजार अर्थात सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टी 50 यांच्यात मोठ्या प्रमाणात शेअरची खरेदी झाली. सेन्सेक्स आता ८३,८२४.४८ वर तर निफ्टी 50 आता २५,७८२.२० आहे. याआधी मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी सेन्सेक्स ८३,७३९.१३ वर तर निफ्टी 50 हा २५,७२७.५५ वर बंद झाला होता.ट्रम्प यांनी घोषणा केली तरी अद्याप भारत आणि अमेरिका यांच्यात मुक्त व्यापार करार झालेला नाही. करारातील प्रमुख मुद्दे काय असतील या संदर्भात भारत आणि अमेरिका एक संयुक्त प्रसिद्धीपत्रक काढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण असे प्रसिद्धीपत्रक अद्याप आलेले नाही. अमेरिका काहीही म्हणत असली तरी जोपर्यंत भारतीय कृषी क्षेत्राचे रक्षण करण्याच्या बाबतीत सहमती होत नाही तोपर्यंत या करारावर सही होणार नसल्याचे स्पष्ट संकेत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहेत.दरम्यान व्हेनेझुएलातील तेल शुद्धीकरणासाठी जगात भारत हाच सर्वोत्तम देश असल्याची जाणीव अमेरिकेला झाली आहे. व्हेनेझुएलातील तेलात सल्फरचे प्रमाण जास्त असते. या पद्धतीच्या तेलाचे शुद्धीकरण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्य आणि क्षमता भारतीय रिफायनरींमध्ये उपलब्ध आहे. याउलट अमेरिकेकडे ही क्षमता फक्त मोजक्याच रिफायनरींकडे आहे. यामुळे व्हेनेझुएलाच्या तेलाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे स्वप्न बघणाऱ्या अमेरिकेला भारताशिवाय पर्याय नसल्याची जाणीव झाली आहे. याचाही फायदा भारतीय बाजाराला होणार असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
शिरोडकर मंडईतील निम्म्या कोळी भगिनींचा बाजार उठवला
मंडईत टॉयलेटसाठी नाही पाणी, गटार तुंबलेलीमुंबई : परेल येथील शिरोडकर मंडईचा पुनर्विकासाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आला असून हे काम सध्या रखडलेले आहे. परंतु, या मंडईतील परवानाधारक कोळी भगिनींना अर्धवट काम राहिलेल्या मंडईतील तळघरातील वास्तूत पुन्हा जागा उपलब्ध करून दिली आहे. पण यामध्ये निम्म्या कोळी भगिनींचा बाजारच उठवला गेला आहे. विशेष म्हणजे या मंडईत मागील पाच वर्षांपासून या कोळी भगिनींचे पुनर्वसन केले असले तरी याठिकाणी पिण्यासह इतर पाण्याची तसेच गटार तुंबून अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली आहे . त्यामुळे आधीच निम्म्या कोळी भगिनींचा बाजार उठवला आता ज्या व्यवसाय करतात त्यांच्या समस्येकडेही बाजार विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने कोळी भगिनींनी याठिकाणी व्यवसाय करायचा कसा असा सवाल केला जात आहे.मुंबई महापालिकेच्यावतीने परेल येथील शिरोडकर मंडईच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मंडईच्या जागी मासळी बाजारसह मार्केट आणि कामगार वसाहत अशाप्रकारे बांधकाम हाती घेतले आहे.. परंतु, या इमारतीचे बांधकाम अर्धवट असून चार मजल्यांचे बांधकाम झाल्यानंतर विकासकाने अर्धवट सोडून दिल्यानंतर जिथे कोळी बांधवांना मागील बाजुस दिलेल्या पर्यायी जागेतून हलवून या अर्धवट वास्तूमध्ये आणले गेले. परंतु याठिकाणी परवानाधारक सर्वच कोळी भगिनींची जागा उपलब्ध नसल्याने अर्ध्याच कोळी भगिनींना याठिकाणी बसता येते. परिणामी निम्म्या कोळी भगिनींना मार्केटमध्ये बसण्याचीच जागा सल्याने त्याठिकाणी केवळ ५० कोळी भगिनींनाच बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.या मार्केटमधील कोळी भगिनींच्या म्हणण्यानुसार, पाच वर्षांपूर्वी पर्यायी जागेवरुन हटवून अर्धवट काम झालेल्या मंडईतील तळघरात अर्थात बेसमेंटमध्ये जागा दिली. तीसुध्दा निम्म्याच कोळणींना बसण्याची जागा दिली. या मार्केटमध्ये एकूण ११४ परवानाधारक कोळी भगिनी होत्या. पण आता त्यात बसण्याची जागा नसल्याने आणि काही कोळी भगिनी येत नाहीतर काहींना वयोमानानुसार बेसमेंटमध्ये टोपल्या घेवून जाणे शक्य नसल्याने त्यांनी येणे टाळले.विशेष म्हणजे या मार्केटमध्ये सुरुवातील सीसी टिव्हीपासून सर्व सुविधा दिल्या होत्या, पण आता तिथे माशांकरता तसेच स्वच्छतागृहांसाठी पाण्याची सुविधा नाही. जर माशांवर शिंपडण्यासाठी पाणीच नसेल तर मासे कसे टिकणार असा सवाल करत कोळी भगिनींनी तेथील टॉयलेटसाठी पाणी नसल्याचीही खंत व्यक्त केली . तसेच ही जागा बेसमेंटमध्ये असल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही, परिणामी मासे खरेदी करणाऱ्यांना या सांडपाण्यात उभे राहावे लागते,तसेच यामुळे उंदिर तसेच घुशींचा त्रासही सहन करावा लागतो. महापालिकेच्या मार्केट विभागाचा अधिकारी कधीही या मार्केटमध्ये येत नाही की कोळी भगिनींच्या तक्रारींची दखल घेत नाही. त्यामुळे नक्की मासळी बाजार हे कोळी भगिनींना व्यवसाय करण्यासाठी आहेत की त्यांचा बाजार उठवण्यासाठी आहे असा सवाल कोळी भगिनींकडून केला जात आहे.
CM Mamata Banerjee: आज सर्वोच्च न्यायालयात एक उल्लेखनीय दृश्य पाहण्याची अपेक्षा आहे. सामान्यतः न्यायालय न्यायाधीश, वकील आणि आरोपींनी भरलेले असते.
Air India and Indigo Flight : मुंबई विमानतळावरील टॅक्सीवेवर एअर इंडिया आणि इंडिगो विमानांचे पंख एकमेकांना घासले.
Ajit Pawar :अजित पवार यांचा विमान अपघात होण्यापूर्णी त्यांनी चुलत पुतण्यासोबत संवाद साधला होता. या संवादाची अॅाडिओ क्लिप समोर आली आहे.
Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?
दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद शिगेला पेटला. अखेर नगरसेवकांना घेऊन वडेड्डीवार दिल्लीत दाखल झाले. पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर वाद निवळला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या वादाच्या निमित्ताने स्थानिक नगरसेवकांची दिल्लीवारी झाली आहे.चंद्रपूरातील महापौर मुद्द्यावर राजधानी दिल्लीत काँग्रेस संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते. सोबतच काँग्रेस नेते सुनील केदार आणि खासदार शामकुमार बर्वे देखील उपस्थित होते. जवळपास 45 मिनिटं झालेल्या बैठकीत महापौर पदाचा तोडगा निघाला अशी माहिती समोर येत आहे.वडेट्टीवारांची नगरसेवकांना घेऊन दिल्लीवारीमागील काही दिवसांपासून चंद्रपूर पालिकेत सत्ता स्थापन करण्यावरून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात वाद पेटला आहे. दोन्ही नेत्यांनी निवडून आलेले आपले समर्थक नगरसेवक वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. वडेट्टवार यांनी आपले समर्थक नगरसेवक आपल्यासोबत ठेवले होते. आज दिल्लीत सगळ्या समर्थक नगरसेवकांना घेऊन वडेट्टीवार दिल्लीत पोहोचले. एका मिनी बसमध्ये सगळ्या नगरसेवकांना घेऊन ते दिल्लीत गेले. जवळपास 19 नगरसेवक हे वडेट्टीवार यांच्यासोबत होते.दिल्लीच्या बैठकीत घडलं काय ?चंद्रपूर महानगरपालिकेतील जवळपास काँग्रेसचे 19 आणि 2 अपक्ष नगरसेवक दिल्लीत दाखल झाले होते. जवळपास 45 मिनिटं बैठक झाली. राजधानी दिल्लीतील 51 लोधी इस्टेट इथं ही बैठक झाली. काँग्रेस पक्षाचा महापौर होईल हे बैठकीत दोन्ही नेत्याकडून वदवून घेण्यात आले. यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेचा महापौराचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरसेवकांच्या संख्येच्या आधारावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे महापौरपद हे वडेट्टीवार यांच्या गटाला मिळते का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला काय पद मिळणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे असणार आहे. या बैठकीमध्ये मार्ग काढण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांचा सल्ला घेण्यात आला होता. के सी वेणुगोपाल यांनी प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांना समोरासमोर बसून महापौराचा मुद्दा निकाली काढण्याचा निर्णय वदवून घेतला. महापौर पदासंदर्भात अजून एक महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे.
Ban On Social Media: स्पेनमध्ये मोठा निर्णय ! ; १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी
Ban On Social Media:
Urmila Matondkar Birthday: बॉलिवूडमध्ये बहुतांश कलाकार यश मिळाल्यावर ते टिकवण्यासाठी झटताना दिसतात. पण काही कलाकार असेही असतात, जे आपल्या आयुष्यात स्वतःच्या अटींवर निर्णय घेतात. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं नाव त्यापैकी एक आहे. प्रचंड लोकप्रियता आणि यश मिळालेलं असतानाच त्यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा धाडसी निर्णय घेतला.
Devendra Fadnavis : अर्थ खातं हाती घेताच मुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडमध्ये; दिला महत्त्वाचा आदेश
Devendra Fadnavis : अर्थ खात्याची जबाबदारी घेताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Chandrapur Election: चंद्रपूर महापौरपदाचा तोडगा सुटला; दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर कोण ठरलं वरचढ?
Chandrapur Election: काँग्रेस महासचिव के.सी वेणुगोपाल यांच्याकडे काल दिल्लीत बैठक झाली.
Top 10 news: ,
Pune District : प्रत्येक शेतकऱ्याला योजनांचा थेट लाभ मिळवून देणे, कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करणे, सौरऊर्जेवर आधारित पंप उपलब्ध करून देणे आणि गावागावात अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करणे हे जाहीरनाम्याचे मुख्य मुद्दे आहेत.
Pune District : बारामती दूध संघाचे ‘सहकारमहर्षी अजितदादा पवार’नामकरण
Pune District : संघाचे चेअरमन संजय कोकरे आणि व्हाईस चेअरमन दत्तात्रय वावगे यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली.
Pune District : काटी-लाखेवाडी गटासाठी विकासाचा अजेंडा जाहीर
Pune District : अजितदादांनी घालून दिलेल्या विकासाच्या पायावरच पुढचा डोलारा उभा राहील, असे स्पष्ट करत श्रीमंत ढोले यांनी भावनिक पण ठाम भूमिका मांडली.
Pune District : भोरच्या स्वप्नपूर्तीसाठी कटिबद्ध : मांडेकर
Pune District : भोलावडे-शिंद जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नांदगाव (ता. भोर) येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
Pune District : महाविस्तार अॅप ठरणार शेतकऱ्यांना ‘डिजिटल मार्गदर्शक’
Pune District : विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. या अॅपमधील मराठी चॅटबॉटच्या माध्यमातून शेतकरी मजकूर किंवा आवाजाद्वारे प्रश्न विचारू शकतात.
31 जानेवारी रोजी चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर 5 राऊंड गोळीबार झाला. या घटनेची जबाबदारी लॉरेन्स गँगचा गुंड शुभम लोणकर याने घेतली. तोच शुभम, जो सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणातही वाँटेड आहे. रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार होण्याच्या 5 दिवसांपूर्वी चित्रपट फायनान्सर सनी नाना वाघचौरे यांच्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. ही धमकीदेखील शुभम लोणकर याने लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने दिली होती. तीन किलो सोन्याची चेन घालणाऱ्या सनीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की, हा केवळ योगायोग होता की पूर्वनियोजित कट? रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या निमित्ताने लॉरेन्स गँगच्या निशाण्यावर बॉलिवूडचे मोठे स्टार्स तर नाहीत ना? मुंबई क्राइम ब्रांच आणि इतर एजन्सीज आता या दृष्टिकोनातून प्रकरणाचा तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी आधी रोहित शेट्टी प्रकरणात शुभम लोणकरचे नाव कोर्टाच्या कागदपत्रांमध्ये ठेवले नव्हते, पण नंतर ते जोडले. मात्र, ज्या लॉरेन्सच्या नावाने गोळीबार झाला आणि धमकावण्यात आले, त्याचे नाव पोलिसांनी यात समाविष्ट केलेले नाही. पोलिस शुभम लोणकरच्या सोशल मीडिया पोस्टची चौकशी करत आहेत. दिव्य मराठीला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील मोठ्या चित्रपट प्रकल्पांशी संबंधित निर्माते, अभिनेते आणि फायनान्सर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर आहेत. ते 1990 मध्ये दाऊद टोळीच्या पद्धतीचे अनुसरण करत आहेत. अबू सालेमच्या धर्तीवर लॉरेन्सचा गुंड खंडणी मागत आहेतरोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर शुभम लोणकर आरजू बिश्नोई नावाच्या फेसबुक पेजवरून एक सोशल मीडिया पोस्ट समोर आली. यात अनेक चित्रपट कलाकारांना लक्ष्य करण्याचा उल्लेख आहे. अशा परिस्थितीत प्रश्न होता की खरंच चित्रपट कलाकार लॉरेन्स टोळीच्या निशाण्यावर आहेत का? हे समजून घेण्यासाठी आम्ही गँगस्टर नेटवर्कवर काम करणाऱ्या सूत्रांशी संपर्क साधला. नाव न सांगण्याच्या अटीवर मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, लॉरेन्स टोळीपासून वेगळे झाल्यानंतर रोहित गोदारा-गोल्डी बराड टोळी देखील चित्रपट कलाकारांना लक्ष्य करत आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये यूपीच्या बरेलीमध्ये अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करण्यात आला. पहिल्यांदा गोळीबाराची बातमी माध्यमांमध्ये आली नाही, तेव्हा दुसऱ्या दिवशी अनेक राऊंड गोळीबार करण्यात आला. यापूर्वी एप्रिल २०२५ मध्ये लॉरेन्स टोळीने सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२५ मध्ये कॅनडाच्या सरे येथील कपिल शर्माच्या कॅफेवर तिसऱ्यांदा गोळीबार झाला. या घटनांवरून हे स्पष्ट होते की लॉरेन्स टोळी चित्रपट कलाकारांना धमकावून कोट्यवधी रुपये वसूलण्याच्या तयारीत आहे. मात्र, लॉरेन्स गँगचा सदस्य शुभम लोणकर जो नमुना वापरत आहे, तोच 1990च्या दशकात दाऊद इब्राहिमचा खास अबू सालेमचा होता. आधी दाऊदच्या नावावर, नंतर स्वतःच्या नावावर अबू सालेम चित्रपट कलाकारांना फोनवर धमकावत असे. गोळीबाराचा आवाज ऐकवून खंडणी मागत असे. तो म्हणायचा- ‘आता पुढची गोळी तुझ्यासाठी चालेल.‘ ‘5 दिवसांत 5 कोटी मिळाले नाहीत तर बाबा सिद्दीकीसारखी अवस्था होईल’एफआयआरनुसार, शुभमने व्यावसायिक आणि फायनान्सर सनी नाना वाघचौरे यांना धमकावण्यासाठी 25 जानेवारीच्या संध्याकाळी आंतरराष्ट्रीय नंबरवरून दोनदा व्हॉट्सॲप कॉल केला, पण फोन उचलला नाही. त्यानंतर काही वेळाने त्याने मेसेज केला, ज्यात लिहिले होते- Shubham Lonkar, Cl me (शुभम लोणकर, मला कॉल कर). सनीने कॉलबॅक केला तेव्हा उत्तर मिळालं- ‘शुभम लोणकर बोलतोय, जर नाव माहीत नसेल, तर गुगलवर सर्च कर, कळेल. जेव्हा कॉल करेन, उचल.’ यानंतर फोन कट झाला. दुसऱ्या दिवशी २६ जानेवारीच्या संध्याकाळी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल आला. हा कॉलही सनीने उचलला नाही. थोड्या वेळाने मेसेज आला, ज्यात लिहिलं होतं- '५ कोटी रुपये देण्यासाठी तयार व्हा. ५ दिवसांत पैसे मिळाले नाहीत तर बाबा सिद्दिकीसारखी अवस्था होईल.’ सनीने आपले वकील आतिश लांडगे यांना याची माहिती दिली. यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांत या प्रकरणाची तक्रार केली. पोलिसांना प्राथमिक तपासात कळले की कॉल आणि मेसेज VPN म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कद्वारे केले गेले होते. कॉल करणारा शुभम लोणकरच होता की आणखी कोणी, याचाही पोलीस शोध घेत आहेत. रोहित शेट्टीच्या घरावर 5 राऊंड फायरिंग, आधी वाटलं फटाके फुटले रोहित शेट्टी 31 डिसेंबरच्या रात्री सुमारे 10 वाजता जुहू येथील त्यांच्या शेट्टी टॉवर या घरी पोहोचले. सुमारे 12:45 वाजता ते कुटुंबासोबत 7व्या मजल्यावर होते. तेव्हा पहिल्यांदा गोळीबार झाला. घराबाहेर दोन खाजगी अंगरक्षक आणि दोन पोलीस कर्मचारी तैनात होते. आधी वाटलं की फटाक्यांचा आवाज आहे, पण पुन्हा आवाज आल्यावर सीसीटीव्ही तपासले असता, गोळीबाराची माहिती मिळाली. काळ्या जॅकेट आणि पांढऱ्या पॅन्ट घातलेला एक तरुण गेटबाहेर उभा दिसला. त्याच्या हातात पिस्तूल होती. गोळीबारादरम्यान जिमच्या काचेवरही एक गोळी लागली. घटनेनंतर तो तरुण आपल्या साथीदारासोबत स्कूटरवरून पळून गेला. शेट्टी कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनंतर जुहू पोलीस घटनास्थळी पोहोचले. तपासात पोलिसांना घटनास्थळावरून काडतुसांचे ५ रिकामे खोके मिळाले आहेत. दरम्यान, आरोपी स्कूटरवरून ट्युलिप स्टार हॉटेल जंक्शनवर पोहोचले. तिथे पोलिसांची नाकाबंदी होती, त्यामुळे आरोपींनी यू-टर्न घेऊन जुहू चर्चच्या दिशेने प्रस्थान केले. दोघांनी तिथेच स्कूटर सोडून दिली आणि ऑटोने पळून गेले. पोलिसांनी जुहू चर्चमधून बेवारस स्कूटर जप्त केली आहे. स्कूटरची तपासणी केली असता मालकाचा पत्ता लागला. त्यांनी चौकशीत सांगितले की, काही दिवसांपूर्वीच स्कूटर (MH12FN2205) आदित्य गायकवाडला ३० हजार रुपयांना विकली होती. पोलिसांनी आतापर्यंत एकूण ४ आरोपींना अटक केली आहे. मात्र, शेट्टी टॉवरवर गोळीबार करणारा शूटर अजूनही फरार आहे. सर्व आरोपी पुण्याचे रहिवासी, कुणी विद्यार्थी, तर कुणी डिलिव्हरी बॉयमुंबई पोलिसांनी सर्वप्रथम आरोपी आदित्य ज्ञानेश्वर गायकवाडला पकडले. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चारही आरोपींच्या बँक व्यवहारांच्या नोंदीतून अनेक पुरावे मिळाले आहेत, ज्यामुळे ते चौघे एकमेकांशी जोडलेले असल्याचे समोर आले. यांनीच स्कूटर आणि शस्त्रांची व्यवस्था केली होती. पोलिसांनुसार, चारही आरोपी पुण्याचे रहिवासी आहेत. यापैकी आदित्यने 30 हजार रुपयांना स्कूटर विकत घेऊन शूटरला दिली होती. आदित्य ऑनलाइन वस्तूंची डिलिव्हरी करतो. त्याच्या चौकशीतून पोलीस स्वप्नील, समर्थ शिवशरण पोमानी आणि सिद्धार्थ दीपक येनपुरे यांच्यापर्यंत पोहोचले. मुंबई पोलिसांमधील आमच्या सूत्रांनी सांगितले की, या चारही आरोपींपैकी स्वप्नील बंदू बेरोजगार आहे. या घटनेला अंजाम देण्यासाठी तोच थेट शुभम लोणकरच्या संपर्कात होता. तर उर्वरित दोन आरोपी समर्थ शिवशरण पोमानी आणि सिद्धार्थ येनपुरे यांनी टोळीत सामील होण्यासाठी स्कूटर आणि शस्त्रे खरेदी करण्यास मदत केली होती. पाचवा आरोपी अजूनही फरार आहे. हाच नेमबाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही हजार रुपये घेऊन तो गोळीबार करण्यास तयार झाला होता. न्यायालयीन कागदपत्रांमध्ये शुभमचे नाव जोडले, लॉरेन्स बिश्नोईचे नाव नाहीरोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर शुभम लोणकरने सोशल मीडियावर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याने लिहिले- ‘सर्व भावांनो, आज मुंबईत (शेट्टी टॉवर) चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर जो गोळीबार झाला आहे, त्याची जबाबदारी शुभम लोणकर, आरजू बिश्नोई, हरी बॉक्सर, हरमन संधू घेतात.’ ‘आम्ही त्याला अनेकदा मेसेज करून सांगितले की आमच्या कामात ढवळाढवळ करू नको, पण त्याला समजले नाही. हा एक छोटासा ट्रेलर दिला आहे. जर त्याने पुढे आमचे ऐकले नाही, तर आता घराबाहेर नाही, तर त्याच्या बेडरूममध्ये, त्याच्या छातीवर गोळी चालेल.’ याच पोस्टमध्ये पुढे लिहिले होते- ‘बॉलिवूडला इशारा आहे की वेळेत सुधारा, नाहीतर वाईट अवस्था होईल. तुमची बाबा सिद्दिकीपेक्षाही वाईट अवस्था करू. आम्ही ज्या-ज्या लोकांना फोन केला आहे त्यांनी एकतर वेळेत मार्गावर या, नाहीतर लपायला जागा कमी पडेल. आमचे जेवढे शत्रू आहेत, तयार राहा, तुमच्याशी लवकरच भेट होईल. एकच होता, एकच आहे आणि एकच राहील, लॉरेन्स बिश्नोई गँग.‘ या घटनेसंदर्भात १ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी न्यायालयात रिमांड अर्ज केला होता. त्यात सांगण्यात आले की ३१ जानेवारीच्या मध्यरात्री जेव्हा गोळीबार झाला, तेव्हा पोलीस विभागाकडून तैनात करण्यात आलेल्या दोन पोलिसांची ड्युटी तिथेच होती. एका पोलिसाचे नाव आशिष राणे आणि दुसऱ्याचे सचिन राणे आहे. घटनेच्या वेळी आशिष राणे शेट्टी टॉवरच्या सातव्या मजल्यावर जेवण करत होते. दुसरा पोलीस कर्मचारी त्यावेळी कुठे होता, याचा उल्लेख कोर्टाच्या कागदपत्रांमध्ये नाही. तर खासगी सुरक्षा रक्षक त्यावेळी गार्ड लॉबीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे पाहत होते. शुभमला फौजी व्हायचे होते, आता मुंबईत वर्चस्व निर्माण करण्याची इच्छा32 वर्षांचा शुभम लोणकर महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोटचा रहिवासी आहे. आधी तो भावासोबत पुण्यात डेअरी चालवत होता. तो आपल्या शरीरयष्टीमुळे सैन्यात भरती होऊ इच्छित होता. 2018-19 मध्ये त्याने राजस्थानमधील जैसलमेर येथे आर्मी भरतीची परीक्षाही दिली होती, पण तो नापास झाला. यानंतर शुभम, लॉरेन्स गँगच्या नेटवर्कशी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडला गेला. मग थेट त्याचे अनमोल बिश्नोईशी बोलणे सुरू झाले. शुभमचे नाव पहिल्यांदा बाबा सिद्दिकी खून प्रकरणात आले. त्यानेच फेसबुक पोस्टद्वारे हत्येची जबाबदारी घेतली होती. तो या हत्याकांडात वॉन्टेडही आहे. शुभम नेपाळमार्गे परदेशात पळून गेला असावा अशी शक्यता आहे. आता अनमोल बिश्नोईच्या अटकेनंतर आणि गोल्डी बराडच्या गँगपासून वेगळे झाल्यानंतर शुभमच लॉरेन्स गँगची महत्त्वाचा दुवा बनला आहे. मागील दोन घटनांमध्ये शुभम लोणकरसोबत आरजू बिश्नोईचे नावही येत आहे. काही महिन्यांपूर्वीच गायक बी प्राकला धमकी देण्याच्या प्रकरणात पहिल्यांदा आरजू बिश्नोईचे नाव समोर आले होते. आता रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर सोशल मीडिया पोस्टवर शुभम लोणकरसोबत आरजू बिश्नोईचे नाव आले आहे. आमचे स्रोत सांगतात की, शुभमनेच आपले नाव आरजू बिश्नोई असेही ठेवले असण्याची शक्यता जास्त आहे. लॉरेन्सनंतर कुख्यात नाव अनमोल बिश्नोईचे होते, पण आता तो पोलिसांच्या निगराणीखाली आहे.
बांगलादेशमध्ये 12 फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार आहेत. शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर 18 महिन्यांनी होणाऱ्या या निवडणुकांमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच बीएनपी (BNP) सत्तेची सर्वात मोठी दावेदार आहे. पक्षाची सूत्रे माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांच्या हातात आहे. दिव्य मराठीने बीएनपीच्या (BNP) सेंट्रल कमिटीचे सदस्य अब्दुल मोईन खान यांच्याशी संवाद साधला. ते पक्षाच्या आंतरराष्ट्रीय सेलचे प्रमुख आहेत. जर बीएनपी (BNP) सत्तेत आली, तर अब्दुल मोईन खान यांना परराष्ट्र मंत्री बनवले जाऊ शकते. अशा परिस्थितीत भारत-बांगलादेश संबंधांची दिशा ठरवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असेल. वाचा संपूर्ण मुलाखत… प्रश्न: भारत-बांगलादेश संबंध आतापर्यंतच्या सर्वात वाईट टप्प्यात आहेत. जर बीएनपीचे (BNP) सरकार बनले, तर भारतासाठी काय भूमिका असेल?उत्तर: बांगलादेशचे परराष्ट्र धोरण अगदी स्पष्ट आहे. सर्वांशी मैत्री, कोणाशीही वैर नाही. आम्ही भारतासाठी यापूर्वीही हेच धोरण अवलंबले आहे आणि पुढेही असेच करू. भारत किंवा इतर कोणत्याही देशात काहीही विशेष नाही. भारत-बांगलादेश संबंध सर्वात वाईट टप्प्यात आहेत की नाही, हे युनूस सरकार सांगेल. सामान्य लोक अंतरिम सरकारच्या परराष्ट्र धोरणामुळे, विशेषतः भारतासोबतच्या संबंधांमुळे आनंदी नाहीत. ते भारतासारख्या मोठ्या शेजाऱ्याशी बिघडत असलेल्या संबंधांमुळेही नाखूष आहेत. प्रश्न: बांगलादेश आणि भारताचे संबंध बिघडण्याचे कारण काय आहे?उत्तर: दोन देशांमधील संबंध सरकारांचे संबंध नसतात. भारताने बांगलादेशच्या बाबतीत खूप मोठी चूक केली. त्यांना अवामी लीग आणि शेख हसीना यांच्याशी चांगले संबंध हवे होते. खरेतर त्यांना बांगलादेशच्या लोकांशी चांगले संबंध निर्माण करायला हवे होते. भारताचे नेते, परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी आणि सुरक्षा दल बांगलादेशच्या लोकांच्या भावना समजून घेण्यात अपयशी ठरले आहेत. जर त्यांनी बांगलादेशच्या लोकांना समजून घेतले असते, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. प्रश्न: तुमची पार्टी भारतासोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी पुढाकार घेईल का?उत्तर: आम्हाला भारतासोबत मैत्री हवी आहे. जगातील सर्व देशांशी चांगले आणि समान संबंध हवे आहेत. दक्षिण आशियाला एक शक्ती म्हणून उदयास येताना पाहू इच्छितो. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना म्हणजेच सार्क देखील आम्ही एकत्र येऊन बांगलादेशातच स्थापन केली होती. जगातील प्रत्येक मुद्द्यावर किंवा संकटात दक्षिण आशिया आपली वेगळी बाजू ठामपणे मांडू शकतो. दुर्दैवाने सार्क कार्यरत नाही. प्रश्न: तुमच्या पक्षाला असे वाटते का की अवामी लीगवरील बंदी उठवावी आणि शेख हसीना परत याव्यात?उत्तर: शेख हसीना यांनी बांगलादेशात जे काही केले, त्यानंतर लोकांनी आपला राग व्यक्त केला. शेख हसीना यांना देश सोडून जावे लागले. शेख हसीना यांना बांगलादेश न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. भारताने त्यांना आश्रय दिला आहे आणि बांगलादेश सरकार प्रत्यार्पणाची मागणी करत आहे. आम्हाला माहीत नाही की भारताने हसीना यांना कोणत्या आधारावर आश्रय दिला आहे. त्यांच्या समर्थनार्थ कार्यक्रम केले जात आहेत. जर हे असेच चालू राहिले, तर भारत आणि बांगलादेशचे संबंध कसे चांगले राहतील. प्रश्न: जर तुम्ही सत्तेत आलात, तर शेख हसीना यांच्या परत येण्यासाठी भारताशी चर्चा कराल का?उत्तर: यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. बीएनपी (BNP) ही लोकांच्या आवाजावर चालणारी पार्टी आहे, लोक जे काही इच्छितील, तेच आम्ही करू. प्रश्न: डॉ. युनूस यांचा दीड वर्षांचा कार्यकाळ तुम्हाला कसा वाटला, अंतरिम सरकार निष्पक्षपणे निवडणुका घेत आहे का?उत्तर: सरकारने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अनेक अधिकारी शेख हसीना यांच्या सरकारमध्ये काम करून चुकले आहेत. तेच आता निवडणुका घेतील. निवडणूक आयोग निवडणुका घेण्यासाठी याच अधिकाऱ्यांवर अवलंबून आहे. प्रश्न: बांगलादेशमध्ये निवडणुकीसोबत सार्वमत (रेफरेंडम) देखील घेतले जात आहे. संविधानात बदल व्हायला हवेत की नाही, यासाठी लोकांना मतदान करावे लागेल. यामुळे गोंधळ निर्माण होईल असे तुम्हाला वाटत नाही का?उत्तर: माझे मत आहे की सरकारने या दोन्ही गोष्टी एकत्र करायला नको होत्या. काही लोकांचे असेही म्हणणे आहे की सार्वमताची (रेफरेंडम) काय गरज आहे.बांगलादेशच्या सध्याच्या लोकशाही व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज लोकांना वाटत आहे. एका व्यक्तीकडे खूप जास्त ताकद नसावी, सत्तेचे संतुलन असावे. अशा परिस्थितीत बदलासाठी बांगलादेशात एकमत झाले आहे.प्रश्न: BNP समोर जमात-ए-इस्लामी एक मोठे आव्हान आहे. तुम्ही जमात आणि तिच्या विचारधारेबद्दल काय विचार करता?उत्तर: 35 वर्षांच्या राजकारणात मला हे समजले आहे की राजकारण आणि निवडणुका या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मला वाटते की जमात राजकारणात चांगली असू शकते, पण निवडणुकीत ते मोठी शक्ती बनू शकणार नाहीत.प्रश्न: जमात-ए-इस्लामीचे मत आहे की बांगलादेशात शरिया कायद्यानुसार शासन चालले पाहिजे, तुमचे काय मत आहे?उत्तर: जमात वेगवेगळी विधाने करते. 6 महिन्यांपूर्वी ते म्हणत होते की देश शरिया कायद्यानुसार चालवायचा आहे. काही दिवसांपूर्वी जमात नेत्याने सांगितले की बांगलादेशात शरिया कायदा लादणार नाहीत. लोकांना वाटते की ते राजकीय सोयीनुसार आपली भूमिका बदलत राहतात. मला वाटते की जमातने स्वतःला पूर्वीपेक्षा बदलले आहे. प्रश्न: जर लोकांनी सार्वमतामध्ये मतदान केले, तर बांगलादेशचे धर्मनिरपेक्षता कायम राहील की ती रद्द केली जाईल?उत्तर: बांगलादेश अधिकृतपणे कधीही धर्मनिरपेक्ष राज्य राहिलेला नाही. भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. होय, बांगलादेशने नेहमीच धर्मनिरपेक्ष देश म्हणून व्यवहार केला आहे. येथे फिरल्यास तुम्हाला कळेल की देशात धार्मिक कट्टरता नाही. प्रश्न: बीएनपीच्या अध्यक्षा खालिदा झिया यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र तारिक रहमान यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. ते बहुतेक वेळा देशाबाहेर राहिले आहेत, लोक म्हणतात की त्यांना बांगलादेशातील जमिनीवरील वास्तव माहीत नाही. यावर कसे सामोरे जाल?उत्तर: तारिक रहमान लोकांशी जोडलेले व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या काम करण्याची स्वतःची शैली आहे. ग्रामीण भागात लोकांमध्ये आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांची चांगली पकड आहे. जमिनीवर त्यांची पकड कमकुवत आहे, हे म्हणणे चुकीचे ठरेल. प्रश्न : बांगलादेशात अल्पसंख्याकांच्या हत्यांच्या बातम्या पाहिल्या-ऐकल्या. दीपू चंद्र दासला भर चौकात मारले आणि झाडाला लटकवून जाळले. असे का होत आहे?उत्तर : अशा एक-दोन घटना घडल्या आहेत. प्रत्येक घटनेत असे म्हणता येणार नाही की एखाद्याला तो हिंदू होता म्हणून मारले गेले. बांगलादेशसारख्या देशाची अडचण अशी आहे की येथे गरिबांना त्रास दिला जातो. लोकांना धर्माच्या आधारावर कमी आणि समाजात त्यांच्या स्तराच्या आधारावर जास्त त्रास दिला जात आहे. प्रश्न: वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे अधिकारी जमात-ए-इस्लामीच्या नेत्यांना भेटत आहेत. अमेरिका बांगलादेशच्या निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे का?उत्तर: मी संपूर्ण अहवाल वाचला आहे. याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. अहवालातील भाषेमुळे गैरसमज निर्माण झाला आहे. यात अधिकाऱ्यांच्या हवाल्याने स्पष्टपणे लिहिले आहे की अमेरिकेने जमातला तिच्या कट्टर भूमिकेबद्दल इशारा दिला आहे. अमेरिकेने जमातला पाठिंबा दिला आहे, ही गोष्ट खरी नाही. प्रश्न: बीएनपी (BNP) निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांवर लोकांमध्ये जात आहे?उत्तर: बांगलादेशचा जन्म लोकशाहीसाठी झाला होता. आम्हाला वाटते की बांगलादेशात लोकशाही असावी. 2009 पासून आम्ही सलग 17 वर्षे लोकशाहीचा अंत होताना पाहिला आहे. या काळात अवामी लीगने दमन, छळ आणि अगदी हत्याही केल्या.विद्यार्थ्यांनी सरकारकडे हीच मागणी केली होती की त्यांना गुणवत्तेच्या आधारावर नोकऱ्या हव्या आहेत, आरक्षणाच्या आधारावर नाही. शेख हसीना सरकारने विद्यार्थ्यांना मारण्यास सुरुवात केली. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, १६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, परंतु शेख हसीना सरकारचा अंत झाला आणि अंतरिम सरकार स्थापन झाले. आता अखेर निवडणुका होणार आहेत. निवडणुकांसोबत जुलै चार्टरवर सार्वमत बांगलादेशात मतदानाच्या दिवशी जुलै चार्टरवर सार्वमत घेतले जाईल. जुलै चार्टर हे संवैधानिक आणि राजकीय सुधारणांचे दस्तऐवज आहे. यात पंतप्रधानांची सत्ता मर्यादित करण्याची चर्चा आहे, जेणेकरून कोणीही कायमस्वरूपी सत्तेत राहू नये. पंतप्रधानांचा कार्यकाळ ८ किंवा १० वर्षांचा करण्याचीही चर्चा आहे.जुलै 2025 मध्ये, राजकीय पक्ष आणि नागरिक संघटना यांच्यात जुलै चार्टर नावाचा संविधान सुधारणा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यात 26 मुद्दे आहेत. चार्टरद्वारे 4 महत्त्वाच्या गोष्टी निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.भविष्यात निवडणुका कशा होतीलसेना किंवा न्यायपालिकेची काय भूमिका राहीलभ्रष्टाचार आणि मानवाधिकारांशी संबंधित नवीन धोरणे कशी असतीलशेख हसीना यांच्यावरील निर्बंध कायम राहतील की नाहीजनमत संग्रहात लोकांना जुलै चार्टर लागू करण्याच्या आदेशावर मत विचारले जाईल. यात अशी तरतूद आहे की, राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या मागण्यांमध्ये संतुलन राखण्यासाठी 100 सदस्यांचे अपर हाऊस (वरिष्ठ सभागृह) प्रतिनिधित्वाच्या आधारावर तयार केले जाईल, म्हणजे, ज्या पक्षाला जेवढी मते मिळतील, त्याच प्रमाणात त्याला जागा दिल्या जातील.
२७ ऑगस्ट २०२५ रोजी ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५०% कर लादला. पाच महिन्यांनंतर ट्रम्प यांनी तो १८% पर्यंत कमी केला. ट्रम्प म्हणतात की, भारत अमेरिकेवर शून्य कर लागू करेल आणि ५०० अब्ज डॉलर्स किंवा ४६ लाख कोटी रुपयांच्या अमेरिकन वस्तू खरेदी करेल. पंतप्रधान मोदींनीही आनंद व्यक्त केला आणि म्हटले की, सरकारच्या संयमामुळेच हा ऐतिहासिक करार शक्य झाला. ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ कमी करण्यास कशी सहमती दर्शविली आणि या व्यापार करारामुळे भारताला किती फायदा होईल? आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घ्या… प्रश्न १: ट्रम्प भारतावरील टॅरिफ कमी करण्यास कसे सहमत झाले? उत्तर: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर, मार्च २०२५ मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा सुरू झाली, परंतु २७ ऑगस्ट रोजी ट्रम्प यांनी भारतावर ५०% कर लादला, ज्यामुळे वाटाघाटी थांबल्या. अमेरिकेची अट अशी होती की भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावे. ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ मध्ये भारत आणि अमेरिकेत बऱ्याच मुद्द्यांवर हातमिळवणी झाली... ७ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी म्हणाले की शेतकऱ्यांचे हित आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ८ ऑगस्ट रोजी ट्रम्पचे सल्लागार पीटर नवारो म्हणाले की त्यांनी रशियाकडून तेल आयात करणे थांबवावे, अन्यथा शुल्क वाढेल. त्यानंतर, ३१ ऑगस्ट रोजी, पंतप्रधान मोदी एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला रवाना झाले. दुसऱ्या दिवशी, नवारो म्हणाले, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेते मोदी यांना पुतिन आणि शी जिनपिंगसारख्या हुकूमशहांना भेटताना पाहणे लज्जास्पद होते. ४ सप्टेंबर रोजी ट्रम्प म्हणाले, आपण भारत आणि रशियाला अंधाऱ्या चीनकडून हरवले. मला आशा आहे की त्यांची भागीदारी दीर्घ आणि समृद्ध असेल. तथापि, यानंतर अमेरिकेचा भारताबद्दलचा दृष्टिकोन बदललेला दिसत होता... ६ सप्टेंबर रोजी ट्रम्प म्हणाले, मोदी एक उत्तम पंतप्रधान आहेत. यावर पंतप्रधान मोदींनी एक्स वर उत्तर दिले, मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावनांचे कौतुक करतो आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देतो. १० सप्टेंबर रोजी ट्रम्प म्हणाले, आपल्या दोन्ही देशांमधील व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत हे कळवताना मला आनंद होत आहे. येत्या आठवड्यात माझे खूप चांगले मित्र पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलण्यास मी उत्सुक आहे. यानंतर, पंतप्रधान मोदींनी X वर असेही लिहिले की, 'मला विश्वास आहे की आमच्या व्यापार वाटाघाटी भारत-अमेरिका भागीदारीचा मार्ग मोकळा करतील.' १६ सप्टेंबर रोजी, सहाय्यक अमेरिकन व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच यांच्या नेतृत्वाखालील एक अमेरिकन शिष्टमंडळ व्यापार करारावर वाटाघाटी करण्यासाठी भारतात आले. येथे, २७ जानेवारी रोजी १६ व्या भारत-ईयू शिखर परिषदेला उपस्थित राहिलेल्या पंतप्रधान मोदींनी भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार कराराची घोषणा केली. भारत आणि युरोपियन युनियनने याला मदर ऑफ ऑल डील्स म्हटले आणि ट्रम्प यांच्या टॅरिफला प्रतिसाद म्हणून ते पाहिले गेले. या करारावर निराशा व्यक्त करताना अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट म्हणाले, युरोप रशिया-युक्रेन युद्धाच्या अग्रभागी आहे. भारत रशियाकडून खरेदी केलेले तेल शुद्ध करत आहे आणि ते युरोपला विकत आहे. युरोप स्वतःविरुद्धच्या युद्धाला स्वतः निधी देत आहे. बेसंट म्हणाले, भारताला रशियन तेल खरेदी करण्यापासून रोखण्यासाठी आम्ही २५% कर लादला. आम्हाला पाठिंबा देण्याऐवजी युरोपने भारतासोबत व्यापार करार केला. दरम्यान, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर म्हणाले की, या कराराचा सर्वाधिक फायदा भारताला होतो. ट्रम्प यांनी सोमवार, २ फेब्रुवारी रोजी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली आणि रात्री १०:२८ वाजता सोशल मीडिया पोस्टद्वारे घोषणा केली.पंतप्रधान मोदींबद्दल मैत्री आणि आदर या भावनेतून, आम्ही अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे, जो तत्काळ प्रभावी होईल. अमेरिका रेसिप्रोकल टॅरिफ २५% वरून १८% पर्यंत कमी करेल. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी X वर लिहिले, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलून मला आनंद झाला. मेड इन इंडिया उत्पादनांवरील शुल्क आता १८% पर्यंत कमी करण्यात आले आहे हे जाणून मला खूप समाधान वाटले. भारतातील १.४ अब्ज जनतेच्या वतीने, या उत्कृष्ट निर्णयाबद्दल मी राष्ट्रपती ट्रम्प यांचे मनापासून आभार मानतो. दुपारी ३ फेब्रुवारी रोजी एनडीए खासदारांसोबत झालेल्या बैठकीत मोदी म्हणाले की टीकेला न जुमानता, सरकारने संयम राखला, ज्यामुळे आज हा ऐतिहासिक करार शक्य झाला. प्रश्न २: टॅरिफ कमी करण्याच्या बदल्यात ट्रम्प यांना भारताकडून काय अपेक्षा होत्या? उत्तर: त्यांच्या पोस्टमध्ये, भारतावरील टॅरिफ कमी करण्याची घोषणा करण्याव्यतिरिक्त, ट्रम्प यांनी त्या बदल्यात आणखी 3 गोष्टी सांगितल्या. प्रश्न ३: तर अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करार झाला आहे का? उत्तर: ट्रम्प यांच्या घोषणेनंतर, भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, फक्त काही कागदपत्रांवर स्वाक्षरी होणे बाकी आहे, परंतु करार जवळजवळ पूर्ण झाला आहे. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांचे शुल्क कमी केल्याबद्दल आभार मानले, जागतिक शांतता प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आणि भारत-अमेरिका भागीदारी पुढे नेण्याबद्दल बोलले असले तरी, त्यांनी करारावर स्वाक्षरी करण्याचा किंवा ट्रम्प यांच्या भारतासाठीच्या मागण्यांचा उल्लेख केला नाही. ३ फेब्रुवारी रोजी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, दोन्ही देश लवकरच या करारावर संयुक्त निवेदन जारी करतील. या कराराबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार, त्यांनी पंतप्रधान मोदींच्या मैत्रीचा आदर केला. प्रश्न ४: अमेरिका आणि भारत यांच्यातील करार आतापर्यंत का अडकला होता? उत्तर: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार तीन प्रमुख कारणांमुळे अडकला होता... १. ट्रम्प यांना भारत-रशिया तेल व्यापारात अडचण आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्पने भारतावर दंड म्हणून २५% कर लादला. १ जानेवारी २०२३ ते १ जानेवारी २०२६ दरम्यान, भारत चीननंतर रशियन तेलाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार होता. भारत आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करत असला तरी, ट्रम्प यांना भारताने रशियाकडून तेल खरेदी करावे असे वाटत नव्हते. २. भारतात अमेरिकन दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवरून वाद अमेरिकेत गायींना दूध उत्पादन वाढवण्यासाठी रक्ताचे जेवण आणि चरबी दिली जाते हे असूनही, भारताने त्यांच्या दुग्धजन्य पदार्थांवरील कर ३०-६०% वरून ५-१०% पर्यंत कमी करावा अशी अमेरिकेची इच्छा आहे. भारताचा या दुग्धजन्य पदार्थांवर आक्षेप आहे. भारतातील बहुसंख्य लोक त्यांना धार्मिकदृष्ट्या आक्षेपार्ह मानतात. भारतातील FSSAI नियमांनुसार, दुग्धजन्य पदार्थांमध्ये भारताच्या अन्न सुरक्षा धोरणाचे उल्लंघन करणारे घटक असू शकत नाहीत. भारताची अट अशी होती की भारतात फक्त पूर्णपणे शाकाहारी दुग्धजन्य पदार्थ विकले जाऊ शकतात. ३. अमेरिकन जीएम पिकांवर भारताचा आक्षेप अमेरिका भारताला मका, सोयाबीन आणि सफरचंद यांसारखी अनुवांशिकरित्या सुधारित कृषी उत्पादने विकू इच्छिते. या जीएम पिकांवरील शुल्क कमी करण्याची मागणी ते करत आहे, परंतु भारत तयार नाही. भारतातील FSSAI नियमांनुसार, तांदूळ, सफरचंद, सोयाबीन आणि कॉर्न सारख्या २४ अन्नपदार्थांच्या आयातीसाठी GM-मुक्त प्रमाणपत्र आवश्यक आहे. भारताने म्हटले आहे की जीएम पिके वापरण्यास सुरक्षित असल्याचे सिद्ध होईपर्यंत त्यांची आयात करण्यास परवानगी दिली जाणार नाही. भारत स्वतः जीएम कॉर्न पिकवत नाही. भारत दरवर्षी ५,००,००० टन कॉर्न आयात करतो आणि त्यावर १५% कर लादतो. या कॉर्नचा वापर इथेनॉल तयार करण्यासाठी केला जातो, जो पेट्रोलमध्ये मिसळला जातो आणि जनावरांच्या खाद्यासाठी वापरला जातो. जर भारताने जीएम कॉर्न आयात केले तर ते पशुधनाला द्यावे लागेल. जीएम कॉर्न खाल्ल्यानंतर आपल्या प्राण्यांनी दूध किंवा मांस तयार करावे असे भारताला वाटत नाही. प्रश्न ५: मग दोन्ही देशांमधील हे अडथळे दूर झाले आहेत का? उत्तर:रशियन तेलावरील वाद काही प्रमाणात मिटला आहे. २०२५ च्या अखेरीस, भारताने रशियन तेल खरेदीत मोठी कपात केली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये, भारताची रशियन तेल आयात ४०% ने घटून ३ वर्षातील सर्वात कमी पातळीवर आली. नोव्हेंबरमध्ये, भारताने रशियाकडून दररोज १७.७ लाख बॅरल तेल आयात केले, तर डिसेंबरमध्ये ही रक्कम दररोज १२ लाख बॅरलपर्यंत कमी झाली. जून २०२५ मध्ये, भारताने रशियाकडून दररोज २० लाख बॅरल इतके तेल आयात केले. याशिवाय १० डिसेंबर २०२५: दिल्लीत अमेरिकन टीमसोबत व्यापार करारावर झालेल्या बैठकीत, काही अमेरिकन जीएम पिकांवर करार होऊ शकतो असे अनेक संकेत समोर आले. १० जानेवारी रोजी, अमेरिकन व्यापार प्रतिनिधी काही अमेरिकन पिके, मांस आणि इतर उत्पादनांना भारतात खूप विरोध आहे. तथापि, यावेळी ते आम्हाला आतापर्यंतची सर्वोत्तम ऑफर देत आहेत, जेमीसन ग्रीर म्हणाले. अनेक देशांनी जैवइंधन उत्पादनासाठी अमेरिकन इथेनॉल आणि सोयाबीनसाठी त्यांची बाजारपेठ खुली केली आहे, २०२६ पर्यंत एकूण $७५० अब्ज खरेदी होणार आहे, ग्रीर म्हणाले. अमेरिकन सिनेट समितीचे अध्यक्ष जेरी मोरन म्हणाले की, भारत अमेरिकन इथेनॉलचा मोठा खरेदीदार बनू शकतो. प्रश्न ६: भारतावर कर आणि व्यापार करारात कपात केल्याने काय फायदा होईल? उत्तर:२०२४ मध्ये, भारताने अमेरिकेला ७.३५ लाख कोटी रुपयांच्या वस्तू निर्यात केल्या. माजी भारतीय व्यापार अधिकारी आणि दिल्लीस्थित थिंक टँक ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हचे संस्थापक अजय श्रीवास्तव यांच्या मते, जर ५०% शुल्क लागू केले गेले तर भारताची अमेरिकेतील निर्यात ४०% पर्यंत कमी होऊ शकते. भारताचे कृषी क्षेत्र, दागिने, कार अॅक्सेसरीज, रिफाइंड पेट्रोलियम आणि कापड उद्योगांना याचा सर्वाधिक फटका बसेल. अमेरिकन उत्पादनांवरील कर कमी केल्याने भारतालाही फायदा होईल. भारत अमेरिकेकडून कच्चे तेल, सोने, पेट्रोलियम उत्पादने, इलेक्ट्रॉनिक घटक आणि कोळसा खरेदी करतो. कर कमी केल्याने भारतात या वस्तू स्वस्त होतील. सीफूड एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CEAI) चे महासचिव के.एन. राघवन यांच्या मते, अमेरिकेला सीफूड निर्यातीतही वाढ होईल. टॅरिफमुळे ही १५% घट झाली आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ कपातीनंतर, भारतीय शेअर बाजारही ३% वाढला. रुपया देखील डॉलरच्या तुलनेत १% मजबूत झाला, जो ९१.७ वरून ९०.४ प्रति डॉलर झाला. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या मते, या व्यापार करारामुळे भारताच्या निर्यातीला चालना मिळेल. यामुळे अभियांत्रिकी भाग उत्पादक, कापड, सागरी वस्तू आणि दागिने यासह सर्व उत्पादन क्षेत्रांना महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होतील. पीयूष गोयल म्हणाले, “हा व्यापार करार भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी, भारतातील १.४ अब्ज नागरिकांसाठी प्रचंड संधी आणेल. आम्ही देशभरातून अहवाल पाहिले आहेत. याबद्दल व्यापक उत्साह आहे.”
अमेरिकेने भारतावरचे आयात शुल्क 7 टक्क्यांनी कमी करून ते 18 टक्के इतके केले आहे. याआधी भारतातून अमेरिकेत आयात केल्या जाणार्या मालावर 25% शुल्क डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केले होते. त्यामुळे भारतातून अमेरिकेला होणार्या
दैनंदिन राशीभविष्य, बुधवार ०४ फेब्रुवारी २०२६
पंचांगआज मिती माघ कृष्ण तृतीया शके १९४७.नक्षत्र पूर्वा फाल्गुनी ,योग अतिगंड,चंद्र राशी सिंह ,भारतीय सौर १५ माघ शके १९४७. बुधवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२६,.मुंबईचा सूर्योदय ०७.१२ मुंबईचा सूर्यास्त ०६.३३, मुंबईचा चंद्रोदय ०८.५७ पीएम, मुंबईचा चंद्रास्त ०८.४६ एएम, राहू काळ १२.५२ ते १२.५२. १२ पर्यन्त चांगलादैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला
मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ३ फेब्रुवारी २०२६ रोजी विमानांचा मोठा अपघात टळला आहे.हाती आलेल्या प्राथमिक वृत्तानुसार, एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीच्या प्रत्येकी एका प्रवासी विमानाचे पंख एकमेकांना धडकले. जेव्हा हा अपघात झाला त्यावेळी दोन्ही विमानांमध्ये प्रवासी होते.कोइम्बतूरला जाण्यासाठी मागे सरकणारे एअर इंडियाचे विमान एआय २७३२ आणि हैदराबादहून आगमन झाल्यानंतर विमानतळाच्या टॅक्सी वे वरून पुढे सरकत असलेले इंडिगोचे विमान ६ई ७९१ यांच्यात टक्कर झाली. दोन्ही प्रवासी विमानांचे पंख एकमेकांना धडकले. एअर इंडिया आणि इंडिगो या दोन्ही कंपन्यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.एअर इंडियाचे विमान उड्डाणासाठी प्रतीक्षेत होते आणि टॅक्सी वे वर पुढे सरकण्यासाठी वाट बघत होते त्याचवेळी दुसऱ्या कंपनीच्या विमानाच्या संपर्कात आले. दोन्ही विमानांच्या पंखांच्या टोकांचा संपर्क झाला, ज्यामुळे आमच्या विमानाच्या पंखांच्या टोकाचे नुकसान झाले, अशी माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, एअर इंडियाचे विमान पुढील तांत्रिक तपासणीसाठी रिकामे केले आहे आणि थांबवले आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे आणि तंत्रज्ञ विमानाची तपासणी करत आहेत. प्रवासी सुरक्षित असून पर्यायी विमानाने लवकरच पुढील प्रवास सुरू करतील, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले.विमानतळावरील घटनेची माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाला अर्थात डीजीसीएला देण्यात आली आहे. प्रवाशांच्या गैरसोयीसाठी एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असेही एअर इंडियाने सांगितले.इंडिगोचे विमान विमानतळावर पार्क केले असून सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या उतरवण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इंडिगोच्या विमानाची तंत्रज्ञांद्वारे तपासणी सुरू आहे. इंडिगोनेही प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले.
मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात असतानाच याठिकाणी मध्य प्रदेशमधील दोन तरुणांनी हे वाहनतळ ताब्यात घेवून तिथे अनधिकृतपणे कारपार्किग चालवून वाहनचालकांकडून पैसे वसूल करत असल्याची बाब समोर आली आहे. यानंतर या दोन्ही तरुणांविरोधात महापालिकेने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.फोर्ट येथील डिएन रोडवरील हुतात्मा चौक येथील महापालिकेने यापूर्वी चालवण्यास दिलेले वाहनतळ संबंधितांकडून काढून तिथे निशुल्क सेवा सुरु केली होती. परंतु असे असतानाच याठिकाणी दोन व्यक्ती हे खाजगी वाहना चालकांकडून अनाधिकृतरित्या पार्कीगच्या नावाखाली पैसे घेत असल्याचे दिसून आले. या व्यक्तींकडे व्हॅलेट टॅग नावाचे पार्किंग पावती दिसून आली. यापावतीबाबत महापालिकेच्या मुकादमांनी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याठिकाणी निशुल्क सेवा असतानाही या व्यक्तींकडून पार्कींगच्या नावाखाली प्रती तास १५० रुपये आकारले जात होते. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याची वर्दी पोलिसांमध्ये दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीमध्ये हे दोन्ही तरुण १८ वर्षांचे असून पंजाब ग्रील हॉटेलसमोरील पदपथावर राहतात आणि मध्यप्रदेशमधील सतनामध्ये राहणारे आढळून आले. त्यानंतर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून बऱ्याचदा पादचाऱ्यांसाठी अडचणीच्या ठरतात. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी दादर रानडे मार्गावर घडला आहे. युटीलिटी डकच्या मॅनहोल्सजवळ योग्यप्रकारे असमांतर रस्ता बनल्याने ज्येष्ठ नागरिक ठेच लागून पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबाने याप्रकरणी महापालिकेच्या जी उत्तर विभागाला निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि या उपचारासाठी झालेल्या सर्व खर्चाची मागणी केली आहे.दादर पश्चिम येथील रानडे मार्गावर शौकीन पान शॉपसमोरील डकच्या आसपास असमांतर रस्ता असल्याने त्याला पाय अडकून ७४ वर्षीय कांतीलाल देढीया हे जखमी झाले. त्यांच्या गुडघ्याला मार लागून हातही फॅक्चर झाला. महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मॅनहोल्सच्या आसपासची जागा समांतर न करता असमांतर केल्यामुळे पायाला ठेच लागून कांतीलाल देढीया हे पडले आणि जखमी झाले. त्यानंतर तेथील फळ विक्रेत्यांना बाजुला करत त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया केली. त्यानंतर देढीया कुटुंबाने त्यांच्यावर भाटीया रुग्णालयात उपचार केले.यानंतर कांतीलाल देढीया यांनी महापालिका जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त यांना निवेदन देत याबाबती तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असून त्यांच्या उपचारासाठी झालेला खर्च हा महापालिकेने आपल्याला द्यावा अशी मागणी निरव देढीया यांनी महापालिकेकडे केली आहे.. खड्डे आणि खराब रस्त्यामुळे हा प्रकार घडला आहे. त्यामुळे औषध उपचाराचा खर्चाची मागण करतानाच ही दुर्घटना जिथे घडली त्या रानडे मार्गाच्या त्या भागाची सुधारणा करून पादचाऱ्यांना सुरळीत चालता येईल अशाप्रकारे रस्ता बनवून दिला जावा अशीही मागणी केली आहे. यावेळी निरव यांनी वडिलांच्या उपचारासाठी झालेली सर्व रुग्णालयाची बिले तसेच औषधांची बिलेही जोडली आहेत...................दादर भागातील अनेक रस्ते तसेच पदपथ हे असमांतर असल्यामुळे बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिकच नाही तर अनेक जण पडत असतात. त्यातील काहीजण जखमी झाले आहेत. देढीया प्रकरणात तर हे आता त्यांच्या कुटुंबाने तक्रार केली आणि उपचाराचा खर्च मागितला म्हणून हे समोर आले आहे. पण दादरमधील प्रत्येक रस्ते आणि पदपथ हे असमांतर असल्यामुळे महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेवून सर्वच पदपथ चालण्याजोगे करावेत आणि रस्तेही. -सुनील शाह, अध्यक्ष दादर व्यापारी संघ
Stock Market Rise: गोल्डीआम इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरचा भाव 20 टक्क्यांनी, वैभव ग्लोबल कंपनीच्या शेअरचा भाव 9.13 टक्क्यांनी, कल्याण ज्वेलर्स कंपनीच्या शेअरचा भाव 4.91 टक्क्यांनी, शृंगार हाऊस ऑफ मंगळसूत्र कंपनीच्या शेअरचा भाव 4.51 टक्क्यांनी वाढला.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटातील अनेक नेत्यांनी दावा केला आहे
India-US Trade Deal:
महाराष्ट्र सरकारने प्रमुख राज्य सहयोगी म्हणून ग्लोबल बिझनेस समिट २०२६ सोबत सहयोगाची घोषणा केली आहे. हे समिट जागतिक व्यवसाय प्रमुख, धोरणकर्ते व संस्थात्मक गुंतवणूकदार यांना महाराष्ट्राचे प्रबळ धोरण आराखडा, धोरणात्मक उपक्रम आणि गुंतवणूकदार-अनुकूल परिसंस्था दाखवण्यासाठी व्यासपीठ ठरेल.महाराष्ट्र सरकारच्या उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाचे प्रधान सचिव आयएएस डॉ. पी. अनबलगन म्हणाले, ''गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये स्थिरपणे गुंतवणूक होत आहे. यामधून भारतातील व जगभरातील कंपन्यांचा राज्याची धोरणे आणि विकास दृष्टिकोनामध्ये असलेला विश्वास दिसून येतो. ग्लोबल बिझनेस समिट २०२६ सोबत आमचा सहयोग आम्हाला जागतिक गुंतवणूकदारांशी संलग्न होण्यास, क्षेत्रांमधील संधी दाखवण्यास आणि शाश्वत औद्योगिक व तंत्रज्ञान विकासामध्ये महाराष्ट्राची भूमिका दृढ करण्यास मदत करेल.''ग्लोबल बिझनेस समिट २०२६ महाराष्ट्राला असे धोरणात्मक उपक्रम जागतिक स्तरावर सादर करण्याची संधी देते. प्रबळ पायाभूत सुविधा, कुशल कर्मचारीवर्ग आणि उत्तमरित्या विकसित केलेला औद्योगिक पाया यांसह राज्य तंत्रज्ञान, एरोस्पेस व संरक्षण, अक्षय ऊर्जा, कृषी व अन्न प्रक्रिया, लॉजिस्टिक, फार्मास्युटिकल्स व केमिकल्स, ऑटोमोटिव्ह, वस्त्रोद्योग आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूकीच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देते. राज्य प्रमुख शहरांसह द्वितीय व तृतीय श्रेणीच्या प्रदेशांमध्ये देखील गुंतवणूकीला चालना देत आहे.महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठी राज्य अर्थव्यवस्था आहे, जेथे देशाच्या एकूण जीडीपीमध्ये राज्याचा वाटा १३.६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. २०२९-२०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या दीर्घकालीन ध्येयासह राज्य सरकार स्पर्धात्मकता वाढवण्यावर, रोजगार निर्माण करण्यावर आणि संतुलित प्रादेशिक विकासाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. या ध्येयाला अधिक पाठिंबा देण्यासाठी सरकारने नुकतेच महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण २०२५ आणि महाराष्ट्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) पॉलिसी २०२५ यांना मंजूरी दिली आहे.महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण २०२५ पुढील दशकामध्ये औद्योगिक व सेवा-केंद्रित विकास करण्याच्या राज्याच्या धोरणाला सादर करते. हे धोरण देशांतर्गत व परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यावर, उत्पादन व सेवांना पाठिंबा देण्यावर, नाविन्यतेला चालना देण्यावर आणि सुलभपणे व्यवसाय करण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करते. तसेच, हे धोरण एमएसएमई विकास, रोजगार निर्मिती आणि शाश्वत औद्योगिक विकासावर देखील भर देते. या धोरणांतर्गत 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र'सारख्या संस्थात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहे. 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' हा एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जो गुंतवणूकदारांना सर्वप्रकारे साह्य करण्यासाठी आणि सरकारी विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.महाराष्ट्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) पॉलिसी २०२५ ग्लोबल कॅपिबिलिटी सेंटर्ससाठी प्रमुख गंतव्य म्हणून राज्याचे स्थान अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित करते. या धोरणांतर्गत ४०० नवीन जीसीसींची स्थापना करण्यात येईल, तसेच २०२५ ते २०३० दरम्यान जवळपास ४ लाख उच्च-कुशल रोजगार निर्माण करण्यात येतील. या धोरणांतर्गत जवळपास ५०,६०० कोटी रूपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे संशोधन व विकास, डिजिटल सेवा आणि विशेष व्यवसाय कार्यसंचालन अशा क्रियाकलापांना पाठिंबा मिळेल. या धोरणामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विशेष इन्सेंटिव्ह्ज आणि पायाभूत सुविधांना पाठिंबा देण्याचा देखील समावेश आहे.
Masoud Pezeshkian : अमेरिकेबरोबरची चर्चा निष्पक्ष व्हावी.! इराणच्या अध्यक्षांनी व्यक्त केली अपेक्षा
दुबई – अमेरिकेबरोबरचा तणाव कमी करण्याच्या हेतूने होणारी चर्चा निष्पक्ष आणि न्याय्य असावी, असे निर्देश इराणचे अध्यक्ष महसूद पेझेश्कीयान यांनी परराष्ट्र मंत्रालयाला दिले आहेत. हिंसक आंदोलनामुळे अमेरिकेबरोबर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेबरोबर चर्चा व्हावी,यासाठी इराणकडून प्रथमच स्पष्ट संकेत दिले गेले आहेत. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कीयान हे सुधारणावादी नेते म्हणून ओळखले जातात. देशातील परिस्थिती आता आपल्या […]
मोठी बातमी..! राष्ट्रवादीच्या तडफदार जिल्हाध्यक्षाचं निधन; पवार कुटुंबियांचा एकनिष्ठ नेता गमावला
Ravindra Nana Pagar passed away : राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार यांचे अल्पशा आजाराने आज 3 फेब्रुवारी रोजी निधन झाले.
Aluminum And Steel Tariffs: अमेरिका भारतीय अल्युमिनियम, पोलाद, लोखंड इत्यादी वस्तूवर पूर्वीप्रमाणे 50 टक्के आयात शुल्क लावणार असल्याचे स्पष्टीकरण या उद्योगाने केले आहे.
Trinamool Congress : बंगालमधील तृणमूलचा पाठिंबा घटतोय; भाजपचा दावा
पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बंगालमधील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसचा (Trinamool Congress) पाठिंबा घटत चालल्याचा दावा त्या पक्षाने केला आहे.
USD INR: डॉलरच्या तुलनेत रुपया झाला मजबूत; भारतात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढणार
USD INR: रुपयाचे मूल्य मंगळवारी तब्बल 122 पैसे म्हणजे 1.22 टक्क्यांनी वाढून 90.27 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले.
धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी माहिती हाती आली आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी ही माहिती दिली आहे. अर्चना पाटील सुनेत्रा पवार यांच्या नातेवाईक आहे. मागील दोन दिवसांपासून त्या मुंबईत होत्या. त्यांनीच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे.अजित पवार चार्टर विमानाने मुंबईहून बारामतीला चालले होते. या विमानाला सकाळी ८.४५ च्या सुमारास अपघात झाला. बारामती येथील धावपट्टीजवळ विमान कोसळले. या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताआधी अजित पवारांनी फोन केला होता. ही माहिती भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी दिली आहे.राणा जगजितसिंह पाटील यांची पत्नी अर्चना पाटील या धाराशिव जिल्ह्यात तेर गटामधून जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे. त्या भाजपच्या उमेदवार आहेत. पण राष्ट्रीय पातळीवर एनडीए आणि राज्य पातळीवर महायुतीत सहकारी असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने अर्चना पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता. याच संदर्भात बोलताना अर्चना पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली.अजित पवारांनी स्वतः फोन करुन मी येऊ शकत नाही, पण मंत्री दर्जाच्या माणसाला पाठवतो असे आश्वासन दिले होते, अशी माहिती अर्चना पाटील यांनी दिली.पवार कुटुंबाला मोठं दुःख झालं आहे. सुनेत्रा आत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. निश्चित अभिमान आहे. तेरची मुलगी ही राज्याची उपमुख्यमंत्री झाली आहे. सुनेत्रा आत्यांनी यांनी ग्राऊंड लेव्हलवर काम केलं आहे. काटेवाडी निर्मल गाव योजना त्यांनी राबवली आहे. त्या कायम जितदादांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. लग्न झाल्यापासून मागील ४० वर्षांपासून त्या काम करत आहेत. महाराष्ट्र सरकारचा निर्णय आहे की, घर हे पुरुष आणि महिलेच्या नावावर असले पाहिजे. पण हा निर्णय २० वर्षांपूर्वी सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत राबवला होता. महिलेला घरातून बाहेर काढू नये, म्हणून सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत हा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाची दखल घेऊन राज्य शासनाने तो पूर्ण महाराष्ट्रात अंमलात आणला आहे. त्यांना गोरगरिब महिलांची जाण आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहून आधार वाटतोय. सगळ्या महिला आशेनं पाहत आहेत; असंही अर्चना पाटील म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांचे वडील बाजीराव पाटील हे गावचे सरपंच होते. घरात लोक प्रश्न घेऊन यायचे. त्यामुळे त्यांनी घरात लोकांच्या समस्या कशा सोडवतात हे जवळून पाहिलं आहे. त्या जास्त बोलत जरी नसल्या तरी योग्य निर्णय घेण्यास त्या सक्षम आहेत, असंही अर्चना पाटील म्हणाल्या.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ
नवी दिल्ली : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला असून, संस्थेतील बेकायदेशीर सदस्य नोंदणीवरून अत्यंत कडक शब्दांत फटकारले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली आणि न्यायमूर्ती जोयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने रोहित पवारांच्या नेतृत्वाखालील प्रशासनावर ताशेरे ओढताना म्हटले की, मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देऊन तुम्हाला यापेक्षा फसवणूक करण्यापासून रोखले आहे. ६ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकांवरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.न्यायालयाची परवानगी न घेता आणि घटनेत सुधारणा न करता सुमारे ४०० नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात आली. या नवीन सदस्यांमध्ये रोहित पवारांचे निकटवर्तीय आणि राजकीय कार्यकर्त्यांचा भरणा असल्याचा आरोप माजी क्रिकेटपटू केदार जाधव आणि इतरांनी केला होता. एमसीएच्या मूळ घटनेला बगल देऊन ही प्रक्रिया राबवण्यात आल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाची आक्रमक भूमिका पाहून रोहित पवार यांच्या वकिलांनी याचिका मागे घेण्याची तयारी दर्शवली. न्यायालयाने स्पष्ट बजावले की, एकतर ही याचिका सन्मानाने मागे घ्या, नाहीतर आम्ही ती फेटाळून लावू. अखेर, हे प्रकरण पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या या दणक्यानंतर आता सर्वांचे लक्ष ४ फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे लागले आहे. या निकालामुळे रोहित पवारांची क्रिकेट प्रशासनातील पकड सैल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी दोन महिन्यात साधारण ४०० नव्या सदस्यांची बेकायदेशीर पद्धतीने नोंदणी करण्यात आल्याचा ठपका उच्च न्यायालयाने ठेवला होता. या नोंदणी केलेल्या सदस्यांमध्ये रोहित पवार यांच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि इतर जवळच्या लोकांचा समावेश होता. यात रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती, रोहित पवार यांचे सारसे सतीश मगर, तसेच त्यांच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सदस्य करून घेतले आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बृहन्मुंबईची उत्तम कामगिरी असावी, यासाठी संपूर्ण मुंबई महानगरात स्वच्छता राखून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे. तसेच, महानगरपालिकेतील घनकचरा, पर्जन्यजल, मलनिस्सारण प्रचालन, मुंबई सांडपाणी विल्हेवाट प्रकल्प, शिक्षण आदी विभागांनी मुंबई क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षणासाठी उत्तम समन्वयातून प्रभावी उपाययोजना कराव्यात. मूल्यमापन व अहवालासाठी आवश्यक असलेली सर्वसमावेशक, अचूक व अद्ययावत माहिती संकलित करावी, असे निर्देशही जोशी यांनी दिले आहेत.स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने, महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी ०२ फेब्रुवारी २०२६ बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी यावेळी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी कार्य मंत्रालयाच्या वतीने शहरांमधील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नागरिक सहभागाचे मूल्यांकन करून क्रमवारी लावण्याच्या उद्देशाने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणाचे आयोजन केले जाते. यंदा स्वच्छ सर्वेक्षणाचे दहावे वर्ष आहे. उत्तम स्वच्छता, कचरा वर्गीकरण, संकलन आणि वाहतूक, प्रक्रिया आदी बाबींवर या अंतर्गत मूल्यमापन केले जाते.स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ साठी केंद्र शासनाकडून ‘स्वच्छता की नई पहल-बढाए हाथ, करे सफाई साथ’ ही मध्यवर्ती संकल्पना मांडण्यात आली आहे. या अंतर्गत, स्वच्छतेसंदर्भात नागरिकांचा अभिप्राय आणि पडताळणीला अधिक महत्व देण्यात आले आहे. यानुसार, संकेतस्थळ आणि अॅप्सच्या माध्यमातून वर्षभर डिजिटल अभिप्राय संकलित केले जातील. उघड्यावर शौच व लघवी करण्यावर प्रतिबंधाच्या अनुषंगाने नवीन मानके निश्चित करण्यात आली आहेत. तसेच, शाळांमधील वर्तन बदल कार्यक्रमांवर भर देण्यात येत आहे. यंदाच्या सर्वेक्षणात किनारपट्टीवरील शहरांसाठी स्वतंत्र मूल्यांकन निकष लावण्यात आले आहेत. पर्यटन / वारसा / धार्मिक स्थळे आणि जास्त वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे यांच्याशी संबंधित स्वच्छतेच्या निकषांवरही विशेष भर देण्यात आला आहे.स्वच्छ सर्वेक्षणात या प्रयत्नांचे योग्य मूल्यमापन दिसण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण प्रचालन व प्रकल्प, मुंबई सांडपाणी विल्हेवाट प्रकल्प, पर्जन्य जलवाहिनी तसेच शिक्षण विभाग आदी विभागांनी समन्वयातून प्रभावी उपाययोजना कराव्यात. मूल्यमापन व अहवालासाठी आवश्यक असलेली सर्वसमावेशक, अचूक व अद्ययावत माहिती संकलित करावी. तसेच, यंदा सर्वेक्षणात नागरिक सहभाग व शाळा-आधारित उपक्रमांवर विशेष भर देऊन नागरिक व विद्यार्थ्यांचा या प्रक्रियेत सहभाग सुनिश्चित करावा. विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच स्वच्छतेच्या सवयी रुजल्या तर सामाजिक स्तरावर दीर्घकालीन व शाश्वत वर्तनबदल घडतो. यामुळे, नागरी स्वच्छतेला हातभार लागतो. नागरिकांनीही स्वच्छतेला प्राधान्य देत महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. अश्विनी जोशी यांनी यावेळी केले.
किया इंडियाने जानेवारी २०२६ मध्ये विकल्या २७ हजार ६०३ कार
मुंबई :किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सकारात्मकतेसह कॅलेंडर वर्ष २०२६ ची सुरूवात केली, जेथे जानेवारीमध्ये एकूण २७,६०३ युनिट्सची विक्री केली. जानेवारी २०२५ मध्ये विक्री करण्यात आलेल्या २५,०२५ युनिट्सच्या तुलनेत वार्षिक १०.३ टक्के वाढीची नोंद करत या कामगिरीमधून कंपनीची स्थिर वाढ, प्रमुख विभागांमध्ये स्थिर मागणी आणि भारतातील ग्राहकांमध्ये कियाच्या वैविध्यपूर्ण उत्पादन ऑफरिंग्जसाठी वाढती पसंती दिसून येते.जानेवारीमध्ये कंपनीच्या विक्री गतीचे श्रेय पोर्टफोलिओमध्ये सतत मागणीला जाते. ऑल-न्यू किया सेल्टोसला बाजारपेठेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, किया सोनेटची कामगिरी कायम राहिली आहे आणि ग्राहकांकडून किया कॅरेन्स क्लॅव्हिस व क्लॅव्हिस ईव्हीसाठी सतत पसंती मिळत आहे. न्यू-जनरेशन सेल्टोस भारतातील सर्वात प्रभावी व मध्यम आकाराची एसयूव्ही म्हणून आपला वारसा अधिक दृढ करत आहे, तसेच किया इंडियाच्या विकासाच्या पुढील टप्प्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज आहे. सोनेटने उच्च आकारमानाच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागामध्ये ब्रँडची प्रबळ उपस्थिती दर्शवणे सुरूच ठेवले आहे. तसेच, कॅरेन्स लाइन-अपने रिक्रिएशन वेईकल व ईव्ही क्षेत्रातील कियाची उपस्थिती अधिक प्रबळ केली आहे, ज्यामधून वैविध्यपूर्ण व भविष्यासाठी सुसज्ज गतीशीलता सोल्यूशन्ससाठी ग्राहकांची वाढती पसंती निदर्शनास येते.या मासिक कामगिरीबाबत मत व्यक्त करत किया इंडियाच्या सेल्स अँड मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. अतुल सूद म्हणाले, ''वर्ष २०२६ मधील प्रेरणादायी शुभारंभामधून ग्राहकांचा किया ब्रँडवर सतत असलेला विश्वास दिसून येतो. न्यू-जनरेशन सेल्टोससाठी सकारात्मक प्रतिसाद, सोनेटसाठी स्थिर मागणी आणि कॅरेन्स क्लॅव्हिस व कॅरेन्स ईव्हीसाठी वाढती लोकप्रियता यामधून आमच्या पोर्टफोलिओची क्षमता व संतुलन निदर्शनास येते. या कामगिरीमधून विभागांमध्ये वैविध्यपूर्ण, भविष्यासाठी सुसज्ज उत्पादने प्रदान करण्यावरील, तसेच सतत एकूण मालकीहक्क अनुभव अधिक उत्साहित करण्यावर आम्ही आमचे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते.''कियाचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण होत आहे, जेथे डिझाइन, तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. न्यू-जनेरशन सेल्टोस व सोनेट त्यांच्या विभागांमध्ये प्रगत कनेक्टिव्हीटी व ड्रायव्हरला साह्य करणारी वैशिष्ट्ये देतात, तर कॅरेन्स क्लॅव्हिस स्थिर ६-सीटर व ७-सीटर कॉन्फिग्युरेशन व तिसऱ्या रांगेमध्ये केबिनसह वरचढ ठरते. तसेच कियाची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकल क्लॅव्हिस ईव्ही व्यावहारिक सात-आसनी ईव्ही आहे. या ईव्हीमध्ये कनेक्टेड तंत्रज्ञान असण्यासह आरामदायीपणा, सुरक्षितता व दैनंदिन उपयुक्ततेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.सुव्यवस्थित उत्पादन पोर्टफोलिओसह किया इंडिया आगामी महिन्यांमध्ये ही गती कायम ठेवण्यास उत्तमरित्या सुसज्ज आहे. कंपनी ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांची पूर्तता करत एकूण ब्रँड अनुभव उत्साहित करण्याप्रती कटिबद्ध आहे, जेथे ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाच्या पाठबळासह वेळेवर उत्पादनामध्ये सुधारणा करत आहे.कियाचे ३७६ शहरांमधील ८४१ टचपॉइण्ट्सचे वाढते नेटवर्क किया ब्रँडला देशभरातील ग्राहकांच्या जवळ नेत आहे, तसेच महानगर व उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये सेल्स, सर्विस व मालकीहक्क साह्य सहजपणे उपलब्ध होण्याची खात्री घेत आहे. या सुविधेला १२२ सर्टिफाईड प्री-ओन्ड आऊटलेट्सचा पाठिंबा आहे, जे ग्राहकांसाठी सुलभ एक्स्चेंजेस्, त्वरित पेमेंट्स आणि त्रासमुक्त मालकीहक्क हस्तांतरणाची खात्री घेतात.
Revanth Reddy : “गुन्हेगारीचे संरक्षण लोकशाहीत होत नाही…”–मुख्यमंत्री रेवंत रेड्डी
जेव्हा हजारो कोटी रुपये आणि शेकडो एकर जमीन बेकायदेशीरपणे लुटली जाते, तेव्हा चौकशी आवश्यक आहे.
Earthquake : भूकंपाने देश हादरला..! नागरिक घरातून सैरावैरा पळाले, सर्वत्र हाहाकार
Myanmar Earthquake : म्यानमारमध्ये रात्री ९:०५ वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. याचे पडसाद कोलकाता आणि पश्चिम बंगालमध्येही उमटले असून नागरिक दहशतीखाली आहेत.
Crime news : ठाण्यात २७ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी महिलेला अटक
ठाणे जिल्ह्यात २७ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन जप्ती प्रकरणी अनेक गुन्हे दाखल असलेल्या एका महिला ड्रग्ज तस्कराला अटक करण्यात आली आहे.
Medha Kulkarni : UPI चा जगभर डंका, पण सुरक्षेचं काय? खासदार मेधा कुलकर्णी यांनी वेधले लक्ष
Medha Kulkarni : खासदार मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत आंतरराष्ट्रीय UPI व्यवहारांच्या सुरक्षा आणि नियामक अडचणींकडे लक्ष वेधले.
India-US Trade Deal: ट्रम्प यांनी टॅरिफ का कमी केले? भारत सरकारने उघड केले गुपित
India-US Trade Deal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या आपल्या वैयक्तिक मैत्रीचा वापर करून देशाच्या हितासाठी हा अत्यंत फायदेशीर करार केल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.
मुंबई : राज्य विधिमंडळाचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण २६ दिवसांचे असण्याची शक्यता असून, त्यापैकी सुट्ट्या वगळता २० दिवस प्रत्यक्ष कामकाज होणार आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या तारखा अंतिम केल्या जातील.संसदीय कार्य विभागाने तयार केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार २३ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार असून, विधान परिषदेत ही जबाबदारी अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल पार पाडणार आहेत. दिवंगत अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थसंकल्प कोण सादर करणार, याबाबत चर्चा सुरू होती. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही धुरा स्वतः खांद्यावर घेतली आहे.अर्थसंकल्पीय तयारी ही दीर्घकालीन प्रक्रिया असते. किमान सहा महिन्यांपासून विविध योजना, तरतुदी, नव्या प्रस्तावांचा समावेश, तसेच ऐनवेळी उद्भवणाऱ्या विषयांसाठीची आर्थिक तरतूद यावर सखोल काम केले जाते. अजित पवार हे गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रक्रियेत सहभागी होते. मात्र आता मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार असल्याने अंतिम टप्प्यात कोणते बदल होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कुडाळच्या विराट सभेत तळ कोकणावर महायुतीचा भगवा फडकवण्याचे आवाहनकुडाळ : कोकणात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांची ताकद एकत्र असून, जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या जिल्ह्यात शंभर टक्के विजयाची खात्री देता येईल, तो जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा कारभार निष्कलंक राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे पार पडलेल्या विराट जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या महाविजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.सभेत शिंदे यांनी मतदारांना आवाहन करत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा फडकवण्याचे आवाहन केले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, रवींद्र फाटक, प्रमोद जठार, दत्ता दळवी, संजय आंग्रे, दीप्ती पडते, श्वेता कोरगावकर यांच्यासह महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिंदे म्हणाले की, मुंबई आणि ठाण्यात महायुतीला मिळालेला विजय हा कोकणातील मतदारांच्या निर्णायक भूमिकेमुळे शक्य झाला आहे. कोकणी माणसाने या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्याचाच परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि राज्यातील अनेक महापालिका व नगरपालिकांमध्ये महायुतीला यश मिळाले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याचे सांगत, कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महायुतीची एकजूट हीच आमची खरी ताकद असल्याचे सांगताना शिंदे यांनी नितेश आणि निलेश राणे एकत्र असल्यामुळे सिंधुदुर्गात विरोधकांची डाळ शिजणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. आधीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनेक जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध किंवा मोठ्या फरकाने निवडून आले असल्याचे सांगत, यावेळीही इतिहास घडेल, असे त्यांनी नमूद केले.नारायण राणे यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना शिंदे यांनी त्यांच्या प्रशासकीय क्षमतेचा उल्लेख केला. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून राणे यांनी घेतलेल्या अभ्यासपूर्ण आणि धाडसी निर्णयांची आठवण करून देत, धोकादायक इमारतींबाबत त्यांनी घेतलेल्या तत्काळ निर्णयांमुळे लाखो लोकांचे घरे वाचल्याचा अनुभव त्यांनी सभेत सांगितला. राणे साहेबांचा दरारा, अभ्यास आणि प्रशासनावरची पकड कोकणाच्या विकासासाठी नेहमीच उपयोगी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिंदे यांनी सांगितले की, राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आज एक आदर्श परिषद म्हणून ओळखली जाते. पुढील काळातही शंभर टक्के विजय मिळवून ही परिषद महाराष्ट्रात आदर्श ठरेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणातील विकास प्रस्तावांना कॅबिनेटमध्ये तात्काळ मंजुरी मिळते, असेही त्यांनी नमूद केले.विकासासाठी मोठ्या बजेटची आवश्यकता असल्याचे सांगत, कणकवलीसारख्या भागांसाठी किमान १०० कोटी रुपयांचे बजेट असावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, पर्यटन, उद्योग, रोजगार आणि मूलभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला.शिंदे यांनी आपल्या कार्यकाळातील लोकहिताच्या निर्णयांची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी 100 टक्के फी सवलत, शेतकरी सन्मान योजना, पीक विमा योजना, १३२ सिंचन प्रकल्पांना गती, महिलांसाठी आरोग्य व सुरक्षितता योजना, तसेच ५ लाख रुपयांचा विमा संरक्षण या सर्व योजना सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या असल्याचे त्यांनी सांगितले.शिंदे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचाही विशेष उल्लेख केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये कोकणाचा विचार करत पर्यटन, बंदरविकास, काजू, आंबा, नारळ यासारख्या स्थानिक उत्पादनांशी संबंधित योजना आणि पायाभूत सुविधांसाठी तरतूद केली आहे. सिंधुदुर्ग हा निसर्गाने नटलेला, छोटा पण प्रचंड विकासक्षम जिल्हा असून, केंद्र आणि राज्य सरकार मिळून या भागाचा सर्वांगीण विकास घडवून आणतील,” असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.“तरुणांच्या हाताला काम, उद्योगांना चालना आणि पर्यटनातून रोजगारनिर्मिती हे आमचे प्राधान्य असून, सिंधुदुर्गाला काहीही कमी पडू देणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. शेवटी शिंदे यांनी मतदारांना आवाहन करत सांगितले की, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांचे अधिकृत उमेदवारच निवडून आणावेत. बंडखोर किंवा इतर कोणालाही मत देऊ नका, असे स्पष्ट करत धनुष्य-बाण, कमळ आणि घड्याळ या चिन्हांवर लक्ष ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले.“ही निवडणूक केवळ मतदानापुरती नाही, तर सिंधुदुर्गाच्या आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा फैसला करणारी आहे. महायुतीला मत म्हणजे विकासाला मत,” असे सांगत त्यांनी सभेचा समारोप केला. उपस्थितांचे आभार मानत त्यांनी “जय महाराष्ट्र”च्या घोषणांसह सभेची सांगता केली आणि महायुतीत नव्याने प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले.
Yumnam Khemchand Singh : मणिपूरमध्ये पुन्हा सरकार होणार स्थापन; युमनाम खेमचंद सिंह बनणार मुख्यमंत्री
मणिपूरमधील भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी मंगळवारी ज्येष्ठ नेते युमनाम खेमचंद सिंह (Yumnam Khemchand Singh) यांची निवड झाली. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून सिंह यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमध्ये पुन्हा लोकनियुक्त सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले.
Ajit Pawar : अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुण्यात शोकसभा
Ajit Pawar : ही शोकसभा बुधवार, दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजताबालगंधर्व रंग मंदिर, शिवाजीनगर, पुणे येथे होणार आहे.
सी-टीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट
मुंबई : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली असून, तसे निर्देश सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्यानंतर १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार ५ फेब्रुवारीऐवजी आता ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्याच वेळी राज्यातील काही शिक्षकांची सी-टीईटी परीक्षा असल्यामुळे संबंधित शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट देऊन, पर्यायी व्यवस्था करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.
Baramati News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बारामतीतील तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश मंगळवारी अधिकाऱ्यांना दिले.
एप्रिल २०१८ मध्ये दंडाधिकारी न्यायालयाने यादव यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
Gold Silver Price Hike: सोने-चांदी पुन्हा सुसाट! तीन दिवसांच्या घसरणीनंतर किमतीत मोठी वाढ
Gold Silver Price Hike: मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ५ मार्च २०२६ च्या डिलिव्हरीसाठी असलेल्या चांदीच्या दरात संध्याकाळी अचानक तेजी दिसून आली.
Giriraj Singh : राहुल गांधींकडून भारतीय सैन्याचा अपमान; भाजप नेते गिरीराज सिंह यांची टीका
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
मुंबई : रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांनी शाहरुख खान अभिनीत बहुप्रतिक्षित चित्रपट ‘किंग’च्या आंतरराष्ट्रीय वितरणासाठी यशराज फिल्म्ससोबत हातमिळवणी केली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन दिग्गज बॅनर्स एकत्र येत असल्याने ‘किंग’बाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.२०२६ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘किंग’ने घोषणेदरम्यानच जबरदस्त चर्चा निर्माण केली आहे. आता यशराज फिल्म्स आंतरराष्ट्रीय वितरणाची जबाबदारी सांभाळणार असल्याने, हा चित्रपट जगभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये भव्य स्तरावर प्रदर्शित होणार आहे.https://www.instagram.com/p/DUSm-bEjMJg/?igsh=am5jMWF0dnMyMGw1या भागीदारीची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली असून, निर्मात्यांनी ‘किंग’च्या जगाची एक झलक चाहत्यांसमोर मांडली आहे. या झलकांमध्ये शाहरुख खान एका धाडसी, आक्रमक आणि नव्या अवतारात दिसत असून, भव्य लोकेशन्स आणि प्रभावी फ्रेम्समुळे चित्रपटाची दृश्यभाषा अधिक ठळक झाली आहे. या दमदार प्रतिमांमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून, २०२६ च्या अखेरीस ‘किंग’ गर्जना करण्यास सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत.रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांच्या निर्मितीखाली तयार होणारा ‘किंग’ हा २०२६ मधील सर्वाधिक अपेक्षित बिग-स्क्रीन स्पेक्टॅकल ठरणार असून, तो २४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : राज्यात औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी विविध विभागांकडील शासकीय जमिनी औद्योगिक वापरासाठी विनामूल्य हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. यामुळे उद्योजकांना कमी दरात भूखंड उपलब्ध होतील आणि राज्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विविध प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासु, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड तसेच संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात सुरू असलेले सर्व प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण होतील, अशा पद्धतीने नियोजन करावे. यासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती देणे आवश्यक असून ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी. प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्याचबरोबर वनक्षेत्र नसलेल्या जास्तीत जास्त सलग जागेचे भूसंपादन करून ती उद्योजकांना उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.औद्योगिक विकासासाठी राज्यात ८ हजार ९६९ एकर क्षेत्र उपलब्धराज्यातील औद्योगिक विकासासाठी विविध विभागांमध्ये एकूण ८ हजार ९६९ एकर क्षेत्र उपलब्ध असून नव्याने २०,४३१ एकर जमीन ताब्यात घेण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात औद्योगिक गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. उद्योजकांच्या गरजांचा विचार करून एमआयडीसीने एक लाख एकर जमीन उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. मुंबई–पुणे–नागपूर पट्ट्यासह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी भागांमध्येही गुंतवणूकदारांकडून जमिनीची मागणी वाढत असून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादनाच्या कामांना गती द्यावी. यासाठी शासन स्तरावरून आवश्यक ते सर्व साहाय्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा घेतला आढावा- बैठकीत एमआयडीसीच्या भूसंपादनासोबतच एमएसआरडीसीकडील शक्तिपीठ एक्स्प्रेस वे, विरार–अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर, नागपूर–गोंदिया, भंडारा–गडचिरोली, नागपूर–चंद्रपूर, नवेगाव–सुरजागड मिनरल कॉरिडॉर तसेच जालना–नांदेड एक्स्प्रेस वे या प्रकल्पांच्या सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेचाही आढावा घेण्यात आला.- उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी कोकणातील भूसंपादन प्रक्रियेदरम्यान कुठेही वनजमिनीचे संपादन करण्यात आले नसल्याची माहिती दिली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील अतिरिक्त गोंडपिंपरी औद्योगिक क्षेत्रात उद्योजकांना जमीन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव मान्यतेसाठी प्राप्त झाला असून, या प्रस्तावास मान्यता देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई : राज्यातील विमानतळ विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची (एमएडीसी) क्षमता वाढवून राज्यातील निर्माणाधीन आणि अपूर्ण असलेली सर्व विमानतळे विकासाकरिता या कंपनीकडे देण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. विमानतळ विकासाची एकसंध आणि प्रभावी यंत्रणा उभारण्यावर भर देत त्यांनी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचनाही त्यांनी दिली.वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुणे शहर आणि परिसर गुंतवणुकीचे केंद्र बनत असून औद्योगिकरण आणि नागरीकरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, प्रधान सचिव (उद्योग) पी. अन्बलगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस यांनी विमानतळासाठी आवश्यक भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करून विमानतळ विकासाचा मोठा टप्पा पार करण्याचे निर्देश दिले. विमानतळ विकासासाठी निधी उपलब्धतेची एक निश्चित पद्धत ठरवावी, तसेच भूसंपादनाची कार्यवाही एमआयडीसीने पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. विमानतळ विकास प्रक्रियेत सिडको आणि नगरविकास विभागाने आपापली जबाबदारी निश्चित करून ती प्रभावीपणे पार पाडावी, असे निर्देश देण्यात आले. विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर संबंधित परिसर ‘डेव्हलपमेंट झोन’ म्हणून विकसित होणार असल्याने सिडकोने आतापासूनच त्या परिसरातील जमीन उपलब्धतेची खात्री करून घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पुरंदर विमानतळाबाबत दिले महत्त्वाचे निर्देश- पुरंदर विमानतळाच्या उर्वरित भूसंपादनासाठी एमआयडीसीने अधिसूचना काढावी, तसेच विमानतळ विकासासाठी निधी उपलब्धतेबाबतचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. सद्यस्थितीत प्रस्तावित क्षेत्रापैकी १ हजार २१६ हेक्टर आर जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण करून त्यासंदर्भातील हरकतींसह सविस्तर अहवाल शासनास सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.- पुरंदर विमानतळासाठी पुणे जिल्ह्यातील वनपुरी, कुंभार वळण, उदाची वाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या गावांमध्ये भूसंपादनासाठी गावनिहाय उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी दर्जाचे भूसंपादन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
BMC Mayor : मुंबईचा महापौर जवळपास निश्चित? ‘या’ तीन महिला नगरसेविकांची नावे आघाडीवर
BMC Mayor : मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी महिला आरक्षण जाहीर झाल्याने चुरस वाढली आहे.
K. Annamalai : भाजप नेते के. अन्नामलाई यांचा विधानसभा प्रभारी पदाचा राजीनामा
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई (K. Annamalai) यांनी घोषणा केली आहे की, ते २०२६ च्या विधानसभा निवडणुकीसाठी कोइम्बतूरमधील सिंगनल्लूरसह सहा मतदारसंघांमधील निवडणूक दौऱ्याच्या प्रभारी पदावरून पायउतार होतील
Today Top 10 News: वाचा आजच्या महाराष्ट्र,देश-विदेश सह सर्व क्षेत्रातील टाॅप बातम्या....
Delhi News : काय सांगता..! दिल्लीत मोफत सिलिंडर मिळणार; मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय
दिल्ली सरकारने राजधानीतील रेशनकार्डधारक कुटुंबांसाठी आणि महिलांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे.
Ind Vs Pak : भारत –पाकिस्तान सामन्यावर गौतम गंभीरच्या ‘त्या’वक्तव्याची होतेय चर्चा
आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक २०२६ ला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. भारत (Ind Vs Pak) आणि श्रीलंका यांच्या संयुक्त आयोजनात होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
Amit Shah : ‘ते’विधान महागात; पियुष गोयल यांना अमित शहांनी फटकारलं
Amit Shah : अमित शहांची पियुष गोयल यांच्यावर नाराजी; पक्षाच्या अंतर्गत निर्णयावर भाष्य करणं टाळण्याच्या सूचना

32 C